कविता म्हणजे भावनांच्या आकाशात उमटलेला शब्दांचा चंद्र…
ती कधी मनाच्या वेदनांना स्पर्श करते तर कधी आनंदाच्या क्षणांना सुंदर रंग देते. “कविता माझ्या नि तुझ्या” हे केवळ शीर्षक नाही तर दोन मनांच्या भावविश्वाला जोडणारा एक हळवा प्रवास आहे.
कविता म्हणजे फक्त शब्दांची मांडणी नसते ती मनाच्या भावनांना मिळालेली सुंदर अभिव्यक्ती असते.. प्रत्येकाच्या आयुष्यात काही क्षण असे येतात जे बोलून व्यक्त करता येत नाहीत तेव्हा कविता आपल्या भावना अलगद शब्दांत उतरवते. “कविता माझ्या नि तुझ्या” म्हणजे दोन मनांमधील नात्याची भावनांची आणि आठवणींची एक सुंदर सांगड होय.
तुझ्या कवितेत प्रेमाची कोवळी चाहूल असते… तुझ्या प्रत्येक ओळीत स्वप्नांचे मोर नाचत असतात… तुझे शब्द जसे मंद वाऱ्याच्या झुळुकीसारखे मनाला स्पर्शून जातात तसेच माझ्या कवितेत आयुष्याच्या अनुभवांचे गहिरे रंग असतात. माझ्या शब्दांत कधी संघर्षाची कहाणी असते तर कधी आठवणींच्या पावसात भिजलेले क्षण… या दोन्ही कविता जेव्हा एकत्र येतात ना तेव्हा त्या जीवनाचे सुंदर गीत बनून जातात… तसेच
तुझ्या कवितेत प्रेमाचा गोडवा असतो तर माझ्या कवितेत आयुष्याचे अनुभव. तुझ्या ओळींमध्ये स्वप्नांची रंगीत दुनिया असते तर माझ्या शब्दांत वास्तवाची जाणीव… पण या दोन्ही कविता एकत्र येतात तेव्हा त्या जीवनाचा अर्थ अधिक सुंदर करून जातात.
कविता ही माणसाच्या मनाचा आरसा असते. मनात दडलेले भाव न सांगितलेली दुःखे, अपूर्ण स्वप्ने आणि निरागस आनंद हे सर्व कविता सहज व्यक्त करते. कधी एखादी कविता डोळ्यांत अश्रू आणते तर कधी तीच कविता जगण्याची नवी प्रेरणा देते म्हणूनच कविता ही केवळ साहित्य नसून ती आत्म्याची भाषा आहे.
कविता माणसाला संवेदनशील बनवते. आनंद, दुःख, विरह, मैत्री, निसर्ग, प्रेम अशा अनेक भावनांना कविता सहज व्यक्त करते… म्हणूनच कविता ही प्रत्येकाच्या जीवनातील एक जिवलग मैत्रीण आहे.
आजच्या धावपळीच्या जीवनात कविता माणसाला थोडा वेळ स्वतःकडे पाहायला शिकवते. ती मनाला शांतता देते आणि विचारांना नवी दिशा देते. “कविता माझ्या नि तुझ्या” हा केवळ शब्दांचा प्रवास नाही तर दोन मनांच्या भावविश्वाला जोडणारा एक सुंदर पूल आहे..
तुझ्या आणि माझ्या कवितेत फरक असला तरी त्यांचा उद्देश एकच असतो मनाला स्पर्श करणे. तुझ्या ओळींमध्ये चांदण्यांची कोमलता आहे तर माझ्या शब्दांत सूर्यकिरणांची ताकद…
तुझी कविता स्वप्न दाखवते आणि माझी कविता त्या स्वप्नांना वास्तवाशी जोडते. या दोन भावना जेव्हा एकत्र येतात तेव्हा त्यातून जीवनाचा खरा अर्थ उमलतो.
आजच्या यांत्रिक आणि धावपळीच्या जीवनात कविता माणसाला स्वतःशी बोलायला शिकवते. ती मनाला शांतता देते.. विचारांना दिशा देते आणि भावनांना मुक्तपणे व्यक्त होण्याचे स्वातंत्र्य देते. कविता माणसाला अधिक संवेदनशील, अधिक जिवंत बनवते… कविता ही मनाची भाषा आहे… ती जितकी तुझी आहे तितकीच माझीही… कारण प्रत्येकाच्या आयुष्यात एक तरी अशी कविता असते जी त्याच्या मनात कायम जिवंत राहते.
शेवटी एवढेच म्हणावेसे वाटते की,
“कविता माझ्या नि तुझ्या” म्हणजे दोन हृदयांची अव्यक्त कहाणी…
☆ काय फरक पडतो?? … मूळ हिन्दी कविता : हेमन्त बावनकर ☆ स्वैर अनुवाद – मंजुषा सुनीत मुळे ☆
अमेरिका – इस्राईल – इराण यांच्यामध्ये सुरु झालेल्या आणि जगभर खळबळ आणि अशांतता माजविणाऱ्या तीव्र संघर्षाचे खेदजनक आणि वेदनादायक पडसाद जगभर वेगवेगळ्या प्रकारे उमटले .. उमटत आहेत.. उमटत राहणार आहेत. या युद्धातला सर्वात जास्त उद्विग्न करणारा हाहा:कार म्हणजे दि. २८ फेब्रुवारी २०२६ रोजी नराधमांकडून केली गेलेली अत्यंत हीन कारवाई ….. दक्षिण इराणमधल्या ‘मिनाब’ मध्ये मुलींच्या प्राथमिक शाळेवर केला गेलेला मिसाईल हल्ला. या हल्ल्यात शंभराहूनही जास्त व्यक्ती मारल्या गेल्या …. ज्यात बहुतांश व्यक्ती म्हणजे या शाळेतल्या लहान लहान मुली होत्या .. ‘ व्यक्ती’ म्हणून अजून पुरेशा उमललेल्याही नाहीत अशा मुग्ध कळ्या ..
…. ज्यांची मने दगडाचीच आहेत त्या निर्घृणांना या घटनेमुळे दु:खच काय .. साधा खेदही वाटला नसेल. पण अतिशय संवेदनशील मन असणारे हिंदी कवी श्री. हेमंत बावनकर यांच्या मनात या प्रसंगामुळे माजलेली खळबळ आणि उद्विग्नता मात्र शब्दरूप घेऊन व्यक्त झाली आणि ‘क्या फर्क पड़ता है?’ या अगदी चपखल शीर्षकाची त्यांची मुक्तछंदातली कविता कागदावर उतरली. त्यांनी अनुभवलेला सृजनाचा हा अतिशय हळवा क्षण या कवितेतून थेट हृदयाला भिडला आणि या काव्याचा स्वैर अनुवाद केल्यावाचून रहावलेच नाही …..
☆ काय फरक पडतो ? ☆ स्वैर अनुवाद – मंजुषा सुनीत मुळे ☆
अजिबात आवाज नको हं ..
शांतता .. एकदम शांतता ..
इथे गाढ झोपल्यात लहान लहान मुली .. शंभराहून जास्त ..
हो खरंच .. शंभराहून जास्त
शिकायला चाललेल्या ..
चालल्या तर होत्या .. पण परत येऊ शकल्याच नाहीत ..
झोपवून टाकलं गेलं त्यांना .. त्या लहान लहान कबरींमध्ये ..
एका भयानक दफनभूमीमध्ये ..
– – पण .. पण यामुळे जगातल्या बाकीच्या तशाच लहान लहान मुलींना ..
त्यांच्या नातेवाईकांना .. आणि .. आणि ..
माणूस म्हणण्याच्या लायकीच्याच नसलेल्या माणसांना ..
काय फरक पडतो ???
..
त्या निष्पाप लहान मुलींना तर हेही माहिती नव्हतं की ..
देश म्हणजे नक्की काय असतं ?
देशाची सीमा काय असते ? ..
धर्म .. पंथ म्हणजे तरी काय ?
वंश म्हणजे नेमकं काय असतं ? .. यातलं काही काही माहिती नव्हतं ..
मित्र देश आणि शत्रू देश म्हणजे नेमके कोण ?
.. आणि ते कसं ठरवतात
.. हे कुठे ठाऊक होतं ?
.. .. त्यांना तर एवढंच समजत होतं की ..
सूर्य एकच असतो ..
चंद्रही एकच असतो ..
आणि ही जमीन सगळ्यांचीच असते.
त्यांचं सगळं विश्व घरापासून सुरू होतं आणि शाळेपर्यंत संपतं सुद्धा..
खायचं-प्यायचं, अभ्यास करायचा आणि आई-वडलांच्या कुशीत स्वतःला विसरून जायचं .. बस् .. ..
– – पण ज्याने कुणी त्यांच्या शाळेला लक्ष्य करून मिसाईल टाकलं ..
.. .. त्यांना या निरागस वास्तवामुळे काय फरक पडतो ???
आपल्याला तर आता सवयच झालीये ..
टि.व्ही. वर लढाया बघायची ..
व्हिडिओ गेम्स बघतो तितक्याच सहजपणे बघायची …
विनाशाच्या या खेळात आता आम्हाला दिसतच नाहीत ..
.. .. पार विध्वंस होत असलेल्या शाळा आणि रुग्णालयं ..
.. शहरं .. तिथल्या दिमाखदार इमारती ..
.. विध्वंस झालेल्या शहरांखाली दडलेली
.. गुदमरणारी शांत- स्वस्थ आयुष्यं …
.. उध्वस्त झालेल्या सुंदर बागा .. .. आता ..
.. आता लहान मुलं , स्त्री-पुरुष ,वृद्ध माणसं
.. सगळेच कसं का जगेनात नाहीतर मरेनात …
.. .. कुणाला काय फरक पडतो ???
शिकण्यासारखं तर खूप काही होतं आपल्याला …
पण काय शिकलो आपण …
– – शासक निरंकुश सत्ताधारी झाले त्यापासून ?
– – नागासाकीत अणुबॉम्बचा विस्फोट केला गेला त्यापासून ?
– – छळछावण्यांकडून ? गॅस चेम्बर्सकडून ? थेट मृत्यूच्या जबड्यात टाकणाऱ्या त्या विनाशक गॅसकडून ?
– – आतंकवादाच्या भयानक सावटाकडून ..
– – जहाल विषारी असणाऱ्या धर्मान्धतेकडून ..
– – सततची युद्ध आणि प्रचंड नरसंहाराकडून … ???
.. .. .. आणि आता हताश झालेल्या त्या शांती आणि सुरक्षिततेच्या भावनेचीच जरी हिंसा झाली
.. शान्तिदूत जन्माला येण्याची शक्यताच जरी मावळली .. तरी ..
मराठी वाचकाला वैशाखवणव्यापासून ते मर्ढेकरांच्या “जगास तोवर वैशाखाच्या मृगाविनाही मृगजळ चढते” या ओळीपर्यंतचा वैशाख परिचयाचा आहे. दुर्गाबाईंच्या ‘ऋतुचक्र’मधला सूर्याच्या आगीत भाजून निघालेला, पण अंगावर नाद-रूप-सुगंधाची सौंदर्यचिन्हं धारण केलेला वैशाख आपण अनुभवलाय.
… याच वैशाखाचं रवींद्रनाथ स्वागत करतात ते नवीन वर्षाचा पहिला महिना म्हणून.
त्यामुळे वैशाखाच्या ऊष्ण निःश्वासाबरोबर जुनं सारं मरणालागुनी जाऊ दे, जुन्या वर्षाचा सारा कचरा निघून जाऊ दे अशा ओळी येतात. आता नव्या वर्षाची नवी गाणी गायची आहेत, म्हणून जुन्या आणि ओझं झालेल्या आठवणी, दुःखं, जुनी झालेली गीतं सोडायची आहेत.
जाक अश्रुबाष्प सुदूरे मिलाक
(उष्णतेमुळे) अश्रूंची (दुःखाची) वाफ होऊन ते दूर जाऊ दे.
ग्लानी, नैराश्य, हतबलता सारं मागे जाऊ दे.
आणि पुढच्या कडव्यात ही ओळ येते.
अग्निस्नाने शुचि होक धरा!
… वैशाखाच्या या सृष्टी भाजून काढणाऱ्या उष्णतेला रवींद्रनाथ अग्निस्नान म्हणतात आणि म्हणून, वैशाखाच्या या पावकस्वरूपी अग्निस्नानाने ही धरा, हे जग पावन होऊ दे, ही प्रार्थना.
किती सुंदर कल्पना. सारं जुनं जाळून नव्या सर्जनासाठी सृष्टी नव्याने उभी करणारा वैशाख.
… फार वेगळा आणि अतिशय सुंदर असा वैशाखाचा अनुभव मला हे गीत देऊन गेलं.
┉❀꧁꧂❀┉
लेखक : कौस्तुभ आजगांवकर
(रवींद्रनाथ – वैशाख)
प्रस्तुती : सुहास रघुनाथ पंडित
सांगली (महाराष्ट्र), मो – 9421225491
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
पहावा.. बहावा — विषय एकच.. चित्रे तीन.. काव्ये तीन १. सुवर्णधुंद — विभावरी कुलकर्णी २. लावण्यशोभा — डॉ. ज्योती गोडबोले ३. बहावा फुलला — डॉ. मधुवंती कुलकर्णी ☆
साहित्य संवेदना प्रस्तुत ‘कवितेचे पान’ या साहित्यिक उपक्रमांतर्गत कवयित्री राधिका भांडारकर यांची अस्सा संसार सुखाचा बाई ही कविता सर्वोत्कृष्ट काव्यरचना म्हणून निवडण्यात आली आहे.
राधिका भांडारकर या आपल्या समुहातील ज्येष्ठ साहित्यिका आहेत. त्यांचे ई अभिव्यक्ती मराठी परिवारातर्फे मन:पूर्वक अभिनंदन!
आपली लेखणी अशीच साहित्याचे अर्थपूर्ण विश्व समृद्ध करत राहो, हीच सदिच्छा व शुभेच्छा ❄️❄️
☆ मनाचे श्लोक – एक सार्वकालिक ‘मनोपनिषद’… – श्लोक ३९ आणि ४० ☆ श्री विश्वास देशपांडे ☆
श्लोक क्र. ३९– –
जया वर्णिती वेदशास्त्रे पुराणे |
जयाचेनि योगे समाधान बाणे|
तयालागी हे सर्व चांचल्य दीजे |
मना सज्जना राघवी वस्ती कीजे|३९|
अर्थ : ज्या परमेश्वराचे वर्णन वेद, शास्त्रे आणि पुराणे करतात, ज्याच्या जवळ गेल्याने आपल्याला अक्षय समाधान लाभते, अशा परमेश्वराला आपल्या मनातील सर्व प्रकारची चंचलता अर्पण करावी. मनाने त्याचेच होऊन राहावे.
विवेचन : माणूस आयुष्यभर सुखाच्या पाठी धावत असतो परंतु एवढी धावपळ करूनही आयुष्याच्या अखेरीपर्यंत त्याला ते गवसत नाही. आपल्या पूर्वजांनी ऋषीमुनींनी देखील समाधानाचा शोध घेतला अखेरीस त्यांना ते भगवंताच्या ठिकाणीच आहे असे आढळून आले. त्याचेच वर्णन आपले वेद, शास्त्रे आणि पुराणे करतात. म्हणून समर्थ देखील आपल्याला सांगतात की जयाचेनि योगे समाधान बाणे. त्याचा योग म्हणजे संबंध आला की अंगी समाधान बाणते म्हणजे त्याची प्रचिती येते.
संत तुकाराम महाराज म्हणतात, “ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. ” हे आपल्याला कळते पण वळत नाही आणि आपला सुखाचा आणि समाधानाचा शोध सुरूच राहतो. प्रत्येक परिस्थितीत आपली सुखाची आणि समाधानाची व्याख्या बदलत जाते. मला नोकरी लागली म्हणजे मी सुखी होईल, माझ्या पगारात वाढ झाली म्हणजे मी सुखी होईल, माझ्याकडे आज चार चाकी आहे, उद्या त्यापेक्षा आणखी चांगल्या प्रकारचे वाहन आले म्हणजे मला समाधान लाभेल. आणखी जमीन, आणखी घरे, बंगले यासारख्या गोष्टी माणूस मिळवण्यासाठी माणूस धडपड करतो आणि त्यासाठी आयुष्यभर धाव धाव धावतो. परंतु त्याची हाव संपत नाही. कुठे थांबायचे हे त्याला कळत नाही.
एका शेतकऱ्याची गोष्ट फार सुंदर आहे. तो आपल्या शेताच्या बांधावर आरामात झोपला होता. त्याची एका मोक्याच्या ठिकाणी शेतजमीन होती. शहरातून आलेला एक कारखानदार ती जमीन विकत घेऊन तिथे कारखाना काढण्याच्या तयारीत होता. तो त्या शेतकऱ्याला म्हणाला, “तू मला ही जमीन दिलीस तर मी तुला भरपूर पैसे देईन. तू श्रीमंत होशील. ” शेतकऱ्यांनी विचारले, ” भरपूर पैसे मिळाल्यावर आणि श्रीमंत झाल्यावर काय होईल ?” जमीनदार म्हणाला, ” वेडा आहेस का ?अरे तू अत्यंत समाधानात राहशील. ” शेतकरी म्हणायला, ” मग त्यासाठी जमीन विकायची काय गरज आहे ? मी आत्ता देखील समाधानीच आहे. ” एका सामान्य शेतकऱ्याला जी गोष्ट कळली ती आपल्याला कळत नाही.
परमेश्वर प्राप्तीच्या आड जर काही येत असेल तर ते म्हणजे आपले मन ! आपले मन अतिशय चंचल आहे आणि ही गोष्ट सगळ्यांनाच माहिती आहे. म्हणून तर एका गाण्यात म्हटले आहे, ” माझिया मना जरा जरा थांब ना, तुझे धावणे अन् मला वेदना !” म्हणून समर्थ म्हणतात की आपले हे चांचल्य म्हणजे चंचलता भगवंताला अर्पण करून आपली चित्त त्याच्याकडे केंद्रित करावे. त्याचे ध्यान लागावे.
गीतेत भगवंत म्हणतात ” सर्वधर्मान्परित्यज्य मामेकं शरणं व्रज ” सर्वधर्म म्हणजे आपली सुखदुःखे, कर्म, वासना आदी सगळे भगवंताला अर्पण करून त्याला शरण जावे. तो आनंदनिधान आहे. अक्षय सुख आणि समाधान त्याच्याच ठायी आहे.
स्वसंवाद ::
१) मी ज्या सुखाच्या शोधात धावत आहे, ते खरोखरच मला समाधान देणारे आहे का? की ही केवळ अंतहीन धावपळ आहे?
२) माझ्या मनातील चंचलता, अपेक्षा आणि असंतोष मी कधी परमेश्वराला अर्पण करण्याचा प्रयत्न केला आहे का?
३) “समाधान” ही बाह्य गोष्टींमध्ये नसून अंतर्मनात आहे हे मला खरेच पटले आहे का? (क्रमशः)
– – – –
श्लोक क्र. ४० – –
मना पाविजे सर्वही सुख जेथे ।
अती आदरे ठेविजे लक्ष तेथे ।
विवेके कुडी कल्पना पालटीजे ।
मना सज्जना राघवी वस्ती कीजे ।४०।
अर्थ :समर्थ आपल्या मनाला सांगतात की हे मना, सर्व सुखे जिथे प्राप्त होतात अशा त्या परमेश्वराकडे अतीव अशा आदराने आपले लक्ष केंद्रित कर. योग्य अयोग्यतेचा विचार करून वाईट विचारांचा/कल्पनांचा त्याग कर आणि राघवाच्या ठिकाणी आपले मन असू दे.
विवेचन :आधीच्या श्लोकात आपण पाहिले की सुखाची आणि समाधानाची प्रत्येकाची कल्पना वेगवेगळी असते. कोणाला पैसा हवा असतो, कोणाला यश तर कोणाला कीर्ती तर कोणाला आणखी काही… माणूस क्षणिक मोहाला बळी पडतो आणि त्या सुखाच्या मागे धावतो परंतु अंतिमतः सुखाऐवजी दुःखच पदरात पडते. क्षणकाल टिकणाऱ्या सुखासाठी आपण फार मोठी किंमत मोजून दुःख पदरात घेतो.
काम, क्रोध, लोभ, मोह यासारख्या विकारांनी मन दूषित होते. असे मन आणखी वाईट विचारांना जन्म देते. माणसाची दिवसेंदिवस अधोगती होत जाते. ज्याप्रमाणे गढूळ पाण्यात आपल्याला प्रतिबिंब दिसत नाही तसेच नाना प्रकारच्या विकारांनी दूषित झालेल्या मनात भगवंताचे प्रतिबिंब पडणे शक्य नसते. म्हणूनच अशा वाईट विचारांचा विवेकपूर्वक त्याग करणे आवश्यक असते. कुडी कल्पना म्हणजे वाईट विचार. ज्या गोष्टी किंवा जे विचार भगवंतापासन दूर नेतात, त्या सगळ्या गोष्टी म्हणजे कुडी कल्पना असे म्हणता येईल. म्हणून तर “सदाचार हा थोर सांडू नये तो, जनी तोचि तो मानवी धन्य होतो” हे समर्थांनी सुरुवातीलाच आपल्याला सांगितले आहे.
एखाद्या विद्वत् सभेत जर विद्वानांना एखाद्या विषयावर त्यांचे मत विचारले तर प्रत्येकाची वेगवेगळी मते येतील. तात्पर्य त्यांच्यामध्ये एकाच विषयावर एकवाक्यता नसते. पण जर सर्व खऱ्या संतांचा (भोंदू बाबा नव्हे) मेळा भरला आणि त्यांना जर अंतिम सुख आणि समाधान कशात आहे हे विचारले तर त्या विषयावर त्यांचे एकमत होईल, एकवाक्यता असेल आणि एका सुरात “भगवंत” असेच उत्तर त्यांच्याकडून येईल.
संत हे ईश्वराचे प्रतिनिधी असतात नव्हे ईश्वर स्वरूपच असतात. परमेश्वराकडे जाण्याचा मार्ग ते आपल्याला दाखवतात. त्यांना लोकांच्या कल्याणाची तळमळ असते. जर अशा सर्व संतांचे अंतिम समाधान हे भगवंताच्या ठायी आहे असे एकमत असेल तर आपण ते का स्वीकारू नये ?
क्षणिक सुखाच्या मागे लागण्यापेक्षा मग संत सांगतात तो मार्ग का स्वीकारू नये ? पंढरीचे सुख नाही त्रिभुवनी, प्रत्यक्ष चक्रपाणि उभा असे.. असे संत चोखामेळा आपल्याला सांगतात. तर देवाचिये द्वारी उभा क्षणभरी, तेणे मुक्ती चारी साधियेल्या… असे संत ज्ञानेश्वर माऊली म्हणतात. संतांचे हे सांगणे आपण लक्षात घ्यायचे नाही का? थोडा विचार केला म्हणजेच विवेकाने वागायचं ठरवलं तर ही गोष्ट आपल्याला पटेल. म्हणून संतांचे सांगणे शिरोधार्य मानून आपण विवेकाने वाईट विचारांचा त्याग करावा आणि राघवाकडे आपले मन लावावे.
स्वसंवाद ::
१) माझे मन गढूळ आहे की स्वच्छ – आज माझ्या मनात कोणते विचार जास्त असतात, चांगले की वाईट ?
२) विद्वान आणि संत यांच्यात फरक आहे – मी माझ्या जीवनात कोणाचे मार्गदर्शन घेतो, बुद्धीचे की श्रद्धेचे ?
३) “विवेके कुडी कल्पना पालटीजे” – आज मी कोणत्या एका वाईट विचाराचा किंवा सवयीचा विवेकाने त्याग करण्यास तयार आहे ?
४) संत चोखामेळा, ज्ञानेश्वर, तुकाराम सर्वांनी एकमताने भगवंत हेच अंतिम सुख सांगितले – हे माझ्या मनाने खरोखर स्वीकारले आहे का ?