मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ वाढदिवस तुमचा आमचा… ☆ स्वाती विकास गाडेकर ☆

स्वाती विकास गाडेकर

? कवितेचा उत्सव ?

☆ वाढदिवस तुमचा आमचा... ☆ स्वाती विकास गाडेकर ☆

वाढदिवस, वर्षातून एकदा येणारा सण..

साजरा करावा तुम्ही, मी आणि आपण!!

 *

दुःखाला, द्यावा थोडा विराम..

बालपणाच्या आठवणी, आठवून करावा आराम!!

 *

येतो आपण एकटे, जातोही एकटे..

परंतु जीवन जगू नये, जसे धरतीवरील गारगोटे!!

 *

ऋण फेडावे, जन्मदात्या मातापित्याचे..

त्याबरोबरच, आपुल्या निसर्ग देवतेचे!!

 *

आयुष्य असते, आपुले थोडे..

समाजास भरभरून, असेल त्यातील द्यावे!!

 *

धमाल मस्ती, करावी दणादण..

जमवावे मित्र, परिवार आणिक आप्तगण!!

 *

साजरा करावा, आनंद बाके..

जीवन आपुले, असे थोडके!!

 *

आनंदाचा क्षण टिपावा..

जीवनाचा पळ अन् पळ लुटावा!!!!

 

© स्वाती विकास गाडेकर

ए१०२, गगनगिरी सोसायटी, सेक्टर १७, वाशी, नवी मुंबई, ४००७०३

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ श्री रविंद्रनाथ टागोर यांची “गीतांजली”… भाग – २० ☆ सौ.मंजिरी येडूरकर ☆

श्री मंजिरी येडूरकर

? इंद्रधनुष्य ?

☆ श्री रविंद्रनाथ टागोर यांची “गीतांजली”… भाग – २० ☆ श्री मंजिरी येडूरकर ☆

श्री रविंद्रनाथ टागोर

वर्डस्वर्थ म्हणतात बालक हा माणसाचा पिता आहे. त्यांचा मुलांच्या निरागसतेवर, प्रामाणिकपणावर, बेफिकीर स्वभावावर व शुद्ध हृदयावर विश्वास आहे. त्याचप्रमाणे टागोर सुद्धा निरागस, निष्कपट बालकांमध्ये रमतात. लहान मुले पाहताना त्यांच्यात त्यांना निसर्ग दिसतो, परमेश्वर अनुभवता येतो.

टागोरांना वाटतं, लहान मुले व निसर्ग आपल्याला खूप कांही शिकवित असतात. टागोरांच्या आठव्या कवितेमध्ये ते एका राजघराण्यातील मुलाबद्दल लिहितात. मौल्यवान वस्त्रांमुळे व अलंकारांमुळे त्या मुलाला खेळतांना मोकळेपणा मिळत नाही. त्यामुळे तो उदास होऊन बसतो. मुलांसाठी खेळ, मित्र त्या मौल्यवान वस्रांपेक्षा जास्त महत्त्वाचे आहेत. पण हे मोठ्या माणसांना कळत नाही. त्यांना आपलं समाजातील स्थान, त्या स्थानाचा आब राखणं जास्त महत्वाचं वाटतं. कवी त्या मुलाच्या आईला सांगतात की या तुमच्या मोठेपणाच्या भ्रामक कल्पनांमध्ये लहानांना जखडू नका. मातीत खेळल्यामुळे मुले निरोगी राहतात. सर्व थरांतील मुलांबरोबर खेळल्यामुळे त्यांना सामाजिक भानही येतं. टागोरांना वाटतं की हे मानवी जीवन जत्रेसारखं आहे. बरंच काही वाईट आहे, दुष्टपणा आहे, गलिच्छपणा आहे, पण बरंच काही आनंद देणारं, चैतन्य देणारं, जगण्याची इच्छा बळावणारंही आहे. जसं जत्रेतून जावं असं कधीच वाटत नाही तसंच हे जीवन देखिल आपल्याला बांधून ठेवतं, आसक्ती निर्माण करतं. लहान मुलं मात्र ह्या लोभ, मोह, स्वार्थ यापासून कोसो दूर असतात.

आजच्या साठाव्या कवितेत देखिल टागोर लहान मुलांच्या विश्वावर भाष्य करतात. हे विश्व म्हणजे एक सागर आहे. ते म्हणतात लहान मुलं निरागसपणे काठावर वाळूत खेळतात. पाण्यात कागदाच्या नावा सोडतात. शिंपल्यांशी खेळतात. वाळूत घर बांधतात. आणि निसर्गाकडून घेतलेलं सगळं निसर्गावरच उधळून देतात. त्यांना ना तिथल्या मोत्यांचा, ना तिथल्या माशांचा हव्यास आहे. लाटा क्रुद्ध होतात तेव्हा त्यांची भीती इतरांना, मोठ्यांना आहे पण लहान मुलांना ती भीती पण नाही. लाटा लहान मुलांसारख्या असतात, त्या कितीही क्रुद्ध झाल्या तरी किनाऱ्यावर येईपर्यंत शांत होतात आणि जणू त्या मुलांसाठी मृदु स्वरांत अंगाई गातात.

टागोरांनी गीतांजलीत लहान मुलांशी संबंधित अशा मोजक्याच ३/४ कविता समाविष्ट केल्या आहेत. त्यातून ते अधोरेखित करतात की, मुलांचे विश्व आणि मोठ्यांचे विश्व खूप वेगळे असते. मोठ्यांना मोह असतो, भय असते. जे मुलांना स्वभावतःच अजिबात नसते. या कवितांमधून ते लहान मूल आणि प्रौढ माणसं यांच्यातल्या विरोधी वृत्ती प्रकर्षाने दाखवतात.

—–

☆ गीत: ५८ ☆

LET all the strains of joy mingle in my last song ⎯ the joy that makes the earth flow over in the riotous excess of the grass, the joy that sets the twin brothers, life and death, dancing over the wide world, the joy that sweeps in with the tempest, shaking and 

waking all life with laughter, the joy that sits still with its tears on the open red lotus of 

pain, and the joy that throws everything it has upon the dust, and knows not a word.

—–

☆ मराठी भावानुवाद : गीत: ५८ ☆

*

आनंदाचे स्वर अखेरच्या

गीतात माझ्या पाझरावे

अवखळ या हरिततृणावर

धरणीने त्या उधळावे

*

जन्ममरणाच्या यमलासी

विश्वात त्याने नाचवावे

कमळाच्या अश्रुत बसोनि

ओघळणे थांबवावे

*

आनंदाने त्या आनंदाला

मृत्तिकेसम उधळावे

या गीतातून तुला अखेरी

मी आनंदा अर्पावे

*

भावानुवाद © मंजिरी येडूरकर 

संपर्क: ९४२१०९६६११

—–

☆ गीत : ५९ ☆

YES, I know, this is nothing but thy love, O beloved of my heart ⎯ this golden light that 

dances upon the leaves, these idle clouds sailing across the sky, this passing breeze leaving its coolness upon my forehead.

The morning light has flooded my eyes ⎯ this is thy message to my heart. Thy face is 

bent from above, thy eyes look down on my eyes, and my heart has touched thy feet.

—–

☆ मराठी भावानुवाद : गीत ५९ ☆

*

प्रकाश किरण सोनेरी

हिरवाई वरी नृत्य करी

*

जलद आक्रमिती नभा

शिरी घेऊनि अमृतकुंभा

*

तृप्तता होतसे जीवाची

मंद झुळूक येता वाऱ्याची

*

भरभरुनि मज देशी सारे

प्रेम यालाच म्हणती ना रे!

*

प्रभात किरणे घेऊन येती

तव संदेशा, मला सुखविती

*

आज सहज मी पाही तुला

ओणवुनि तू निरखिता मला

*

नजरानजर झाली आपुली

शतजन्मांची ओळख पटली

*

आणि त्याच अद्भुत क्षणी

सर्वस्व वाहिले तुझिया चरणी

 *

भावानुवाद © मंजिरी येडूरकर

संपर्क: ९४२१०९६६११

—–

☆ गीत ६० ☆

ON the seashore of endless worlds children meet. The infinite sky is motionless overhead and the restless water is boisterous. On the seashore of endless worlds the children meet with shouts and dances.

They build their houses with sand and they play with empty shells. With withered leaves they weave their boats and smilingly float them on the vast deep. Children have their play on the seashore of worlds.

They know not how to swim, they know not how to cast nets. Pearl fishers dive for pearls, merchants sail in their ships, while children gather pebbles and scatter them again. They seek not for hidden treasures, they know not how to cast nets.

The sea surges up with laughter and pale gleams the smile of the sea beach. Deathdealing waves sing meaningless ballads to the children, even like a mother while rocking her baby’s cradle. The sea plays with children, and pale gleams the smile of the sea beach.

On the seashore of endless worlds children meet. Tempest roams in the pathless sky,

ships get wrecked in the trackless water, death is abroad and children play. On the 

seashore of endless worlds is the great meeting of children.

—–

☆ मराठी भावानुवाद : गीत: ६० ☆

*

अनंत विश्वात मुलांच्या गाठी,

खेळ चाले समुद्राकाठी ॥धृ॥

*

खाली बंडखोर सागर, वर अविचल आकाश

निरागस कोवळी मने, रचिती आनंदाची रास

वाळूचे घर, त्यावर सुंदर शिंपल्याची नक्षी

वाळल्या पानांच्या बोटी, लाटांच्या वक्षी

अनंत विश्वात मुलांच्या गाठी,

खेळ चाले समुद्राकाठी ॥१॥

*

वाळूत रेघोट्या, किड्यांमागे धावती

आत तांडव लाटांचे, किनारी मुले खेळती

रंगीत खडे गोळा करता, आनंद बाल जीवाला

सारी दौलत गोळा केली, उधळती सागराला

अनंत विश्वात मुलांच्या गाठी,

खेळ चाले समुद्राकाठी ॥२॥

*

मच्छीमार माशांसाठी, तर कप्तान व्यापारासाठी,

कुणा खजिन्याचा मोह, उडी पाण्यात मोत्यांसाठी

ना कसब पोहण्याचं, ना खजिन्याची आस

ना जाळं विणण्याची कला, खेळ चाले झकास

अनंत विश्वात मुलांच्या गाठी,

खेळ चाले समुद्राकाठी ॥३॥

*

वाटाहीन नभ अन् वादळ घुमे दिशाहीन

उध्वस्त बोटी, मृत्यूचे तांडव, पाणी मार्गहीन

लाटांचं हास्य क्रूर, शांत हास्य काठात

अंगाईचा झोका हले, क्रुद्ध लाटांच्या गीतात

अनंत विश्वात मुलांच्या गाठी,

खेळ चाले समुद्राकाठी ॥४॥

*

– क्रमशः भाग २० 

मूळ इंग्लिश काव्य : श्री. रविंद्रनाथ टागोर.

भावानुवाद : कवयित्री : © सौ.मंजिरी येडूरकर

लेखिका व कवयित्री, मो – 9421096611

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ जेव्हा ‘मी’ विरघळतो… ☆ अपर्णा परांजपे ☆

सुश्री अपर्णा परांजपे

? इंद्रधनुष्य ?

☆ ✍️ जेव्हा ‘मी’ विरघळतो… ☆ अपर्णा परांजपे

एका शांत आश्रमात एक साधक राहत होता. त्याने अनेक वर्षे तप, जप, ध्यान केलं होतं. आता सर्वजण त्याला “योगीजी” म्हणून ओळखू लागले होते.

एके दिवशी तो आपल्या गुरूकडे गेला—

“गुरुदेव, मला योग प्राप्त झाला आहे. आता मला पुढे काय करायचं? ”

गुरु हसले, पण काही बोलले नाहीत.

काही दिवसांनी तो पुन्हा आला—

“गुरुदेव, मला आता ज्ञानही झालं आहे. शास्त्रांचा अर्थ कळतो, आत्मा कळतो. ”

गुरु पुन्हा शांतच राहिले.

काळ गेला…

एक दिवस तो अत्यंत भावुक अवस्थेत आला— “गुरुदेव, आता माझ्या हृदयात अपार प्रेम आहे. मला वाटतं, मी प्रेमात पूर्ण झालो आहे. ”

यावेळी गुरु त्याच्याकडे प्रेमाने पाहून म्हणाल, “तू अजूनही ‘मी’ मध्येच आहेस. ”

साधक थोडा चकित झाला—

“गुरुदेव, मी इतकी साधना केली, तरी ‘मी’ कसा राहिला? ”

गुरु शांतपणे म्हणाले— “तू म्हणतोस— मी योगी आहे, मी ज्ञानी आहे, मी प्रेमी आहे.

जोपर्यंत ‘मी’ बोलतो आहे, तोपर्यंत तू त्या अवस्थांचा भोग घेतो आहेस, त्यात अडकलेला आहेस. ”

हे ऐकून साधकाच्या मनात काहीतरी हललं…पहिल्यांदाच त्याने स्वतःकडे खोल पाहिलं. त्या रात्री तो एकटाच बसला.

ना जप, ना ध्यान… फक्त शांत साक्षीभाव.

हळूहळू त्याला जाणवलं—

योग, ज्ञान, प्रेम… हे सगळं येतं आणि जातं पण “मी” जो म्हणतो आहे, तोच खरा अडथळा आहे.

अचानक त्याच्या आत काहीतरी विरघळलं…

जणू “मी” हा शब्दच नाहीसा झाला.

फक्त शांतता उरली…

निर्विचार, निरहंकार, नितळ अस्तित्व.

दुसऱ्या दिवशी तो गुरूकडे गेला…

पण यावेळी तो काही बोललाच नाही.

गुरु त्याच्याकडे पाहून हसले—

“आता तुला कळलं…

जिथे ‘मी’ नाही, तिथेच खरा योग, ज्ञान आणि प्रेम आहे. ”

योग प्राप्त झाल्यानंतर जोपर्यंत ‘आपण योगी आहोत’ असा भाव राहतो, तोपर्यंत आपण योगाचे भोगीच आहोत.

आणि ज्ञान प्राप्त झाल्यानंतर जोपर्यंत ‘आपण ज्ञानी आहोत’ असा भाव राहतो, तोपर्यंत आपण ज्ञानाचे भोगीच आहोत.

तसेच प्रेम प्राप्त झाल्यानंतर जोपर्यंत ‘आपण प्रेमी आहोत’ असा भाव राहतो, तोपर्यंत आपण प्रेमाचे भोगीच आहोत.

आणि बंधूंनो, जो प्रेमाचा भोगी आहे, तो कधी-कधी ‘कामाचा’ भोगी होऊ शकतो.

जो ज्ञानाचा भोगी आहे, तो कधी-कधी ‘अज्ञानाचा’ भोगी होऊ शकतो.

आणि जो योगाचा भोगी आहे, तो कधी-कधी ‘भोगाचा’ भोगी होऊ शकतो.

आपली बुध्दी ही खऱ्या ज्ञानापर्यत पोहोचण्यातील खरा अडथळा आहे! हे जाणवणं म्हणजे खरी स्वयंजागृती! ज्याला मी समजतो तो मी मर्यादित आहे व आज बुध्दीचा विलय झाल्यावर उरला तो‌खरा मी आहे जो अनंत आहे अमर्याद आहे असीम आहे, अमर्याद आहे.

कुठे होता तो? आतच होता पण झाकोळला होता मर्यादित मी ने च! इतर कशाचाही अडथळा नव्हता असे समजल्यावर दोषारोप थांबतात व कृतज्ञताच प्रगट होते जी आतून, हृदयातून, सहजतेने प्रकट होते.

 “मीपण विरघळे(वृत्त: आर्या)

मीपण धरुनी अंतरी, म्हणे मी योगी ज्ञानी

भावांच्या या लहरींमध्ये, अडकला जीव अभिमानी ॥

ज्ञानदीप उजळता, उरला तरी सूक्ष्म अहंभाव ।

प्रेमाच्या त्या सागरात, उठती मीपणाचे ठाव ॥

शांत बसुनी पाहता, विरती सारे भाव हळूच ।

उरे न काही म्हणण्यास, साक्षी निखळ तोच ॥

जिथे नाही मीपणा, तिथेच सत्य फुले सहज ।

योग-ज्ञान-प्रेम एक, तेथेच परम तेज ॥

 

“‘मी’ हा सूक्ष्म धागा सुटेपर्यंत, साधना पूर्ण होत नाही;

तो विरघळला की सर्व एकरूप होतं.”

जोपर्यंत ‘मी’ आहे, तोपर्यंत साधना आहे;

जिथे ‘मी’ विरघळतो, तिथेच सत्य प्रकट होतं.

भगवंत हृदयस्थ आहे 🙏

©  अपर्णा परांजपे

कात्रज, पुणे

मो. 9503045495

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ ‘पाच मिनिटं… आणि बदललेलं घर’ – कवी : अज्ञात ☆ प्रस्तुति – शामला पालेकर ☆

शामला पालेकर

? वाचताना वेचलेले ?

☆ ‘पाच मिनिटं… आणि बदललेलं घर’ – कवी : अज्ञात ☆ प्रस्तुति – शामला पालेकर

 

एका मित्राच्या घरी गेलो होतो…

साधंसं २ BHK… पण समाधानाने भरलेलं.

 

मित्र—माझ्याच वयाचा.

शून्यातून उभं राहिलेला.

पुण्यात स्वतःचं घर, छोटंसं का असेना पण स्वतःचं.

बायको—घर सांभाळणारी, मनापासून आदरातिथ्य करणारी.

दोन मुलं—आधुनिक, स्मार्ट, स्वतःच्या जगात रमलेली.

 

अरे पिठलं-भाकरीला ये कधी!

असा अचानक आलेला फोन… आणि मी गेलो.

 

घरात गेलो…

हॉलमध्ये बसलो…

चहा आला… गप्पा रंगल्या…

पण एक गोष्ट सतत खटकत होती—

दोन्ही मुलं समोर बसलेली…

पण खरंतर तिथे नव्हतीच.

त्यांचं पूर्ण जग मोबाईलमध्ये हरवलेलं.

 

इतक्यात एक छोटासा प्रसंग घडला…

मित्राचा मोबाईल हँग झाला.

त्याने मुलाला बोलावलं.

मुलाने दोन सेकंदात सगळं ठीक केलं…

पण जाताना एक वाक्य टाकून गेला—

इतकी घाई कशाला करता? थांबता येत नाही का? ”

मुलगीही लगेच—

हो, परवा पण असंच केलं होतं…

 

त्या दोन वाक्यांनी वातावरण बदललं.

मित्र शांत… सवयीचा झालेला.

पण वहिनीचा चेहरा…

तो मात्र सगळं सांगून गेला.

 

मीही शांत बसलो होतो…

पण आत काहीतरी हलत होतं.

वाटलं—आपलं काम नाही… जेवून निघू.

पण दुसरं मन म्हणालं—

आज नाही बोललास, तर कधीच नाही.

 

मी त्यांना हाक मारली.

पाच मिनिटं द्या… लेक्चर नाही… फक्त गप्पा.

 

ते दोघं आले… मोबाईल बाजूला ठेवून.

आणि तिथून पुढे…

फक्त शब्द नव्हते—

ती एक पिढी दुसऱ्या पिढीशी बोलत होती.

 

मी त्यांना सांगितलं—

हो… आम्ही टेक्नॉलॉजीमध्ये थोडे मागे आहोत.

पण लक्षात ठेवा—

आमच्या आयुष्यात साधा फोनही उशिरा आला.

तिथून इथपर्यंत आलोय… स्वतःच्या बळावर.

 

तुम्ही मोबाईलसोबत मोठे झालात…

म्हणून ते तुम्हाला जमतं.

पण त्यामुळे तुम्ही मोठे होत नाही…

कारण मोबाईल हुशारी नाही मोजत…

तो फक्त वापर मोजतो.

 

आई-बाबांनी गुगलशिवाय आयुष्य जगून दाखवलंय…

तुमच्यासाठी.

आणि तुम्ही… त्यांच्याच पैशाने घेतलेल्या मोबाईलवर

त्यांनाच शिकवता?

 

टेक्नॉलॉजी महत्त्वाची आहे…

पण ती सगळं नाही.

नातं दुखावलं, तर

कोणतीही ‘ऍप’ ते परत जोडू शकत नाही.

 

मोबाईल तुम्हाला जग दाखवतो…

पण घरातली माणसं विसरायला लावतो…

तर तो उपयोगाचा नाही.

 

आम्ही आजही मित्रांना घरी बोलावतो…

गप्पा मारतो…

त्या दोन तासात मोबाईल आठवत नाही.

आणि तुम्हाला…

टॉयलेटलाही मोबाईल लागतो…

मग खरा ‘ऍडिक्ट’ कोण? ”

 

घरात शांतता होती…

पण ती अस्वस्थ नव्हती—

ती विचारांची होती.

 

मी थांबलो.

 

दोन क्षण गेले…

आणि अचानक—

मुलगा उठला…

बाबांच्या जवळ गेला…

आणि हळूच म्हणाला—

सॉरी…

 

तो एक शब्द…

पण त्या घरातला सगळा आवाज बदलून गेला.

 

वहिनीच्या डोळ्यात पाणी आलं…

मुलगी शांत झाली…

मित्र काही बोलला नाही…

पण त्याच्या चेहऱ्यावरचं समाधान…

सगळं सांगून गेलं.

 

मी वातावरण हलकं केलं…

एक जोक सांगितला…

आणि आम्ही सगळे मिळून जेवायला बसलो.

 

 

शेवटी त्यांना एकच सांगितलं होतं—

 

आभाळाला गवसणी घालायची असेल…

तर जमिनीला विसरू नका.

कारण ज्या मातीवर उभं राहून तुम्ही उंच जाता…

तीच माती कधीतरी आधार बनते.

 

आई-बाबा हे फक्त नातं नसतं…

ते तुमचं मूळ असतं.

आणि मूळ जपलं…

तरच झाड कायम हिरवं राहतं…

 

कवी :अज्ञात

प्रस्तुती : शामला पालेकर

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ श्री अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती #३२४ ☆ काठी सावर… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

श्री अशोक श्रीपाद भांबुरे

 

? अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # ३२४ ?

☆ काठी सावर… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

कसरत करते तारेवरची

खाण्यासाठी भाकर मिरची

*

बाप वाजवी ढोल चामडी

पोरे जमली पारावरची

*

सावकारही आला होता

डोक्यावरती टोपी फरची

*

कुणी न आले वाचवायला

फुले वाळली वेलीवरची

*

मनात आहे काय चालले

रेघ सांगते भाळावरची

*

या कष्टाची भीक तोकडी

कळी खुलेना गालावरची

*

तोल म्हणाला नको घाबरू

काठी सावर हातावरची

 © अशोक श्रीपाद भांबुरे

धनकवडी, पुणे ४११ ०४३.

ashokbhambure123@gmail.com

मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ ज्ञानांकुर… ☆ श्रीशैल चौगुले ☆

श्रीशैल चौगुले

? कवितेचा उत्सव ?

☆ ज्ञानांकुर... ☆ श्रीशैल चौगुले ☆

ज्ञानेश ज्ञानीयाचा अंकुर

तेवे दृष्टी आभाळी कुर्पुर ||

चैतन्य भरोनीया आत्मीए

भक्ती दृढ देवलोकी दुर ||

 *

आकांक्षा अलौकिक ज्ञानीया

गीता श्लोक ज्ञानेश्वरी स्तर||

 *

स्पंद बनोनीया महामंत्र

ओम् तत् सत् विश्वात स्वर||

 *

धन्य भगवंत थोर संताशी

संजीवन समाधी चरा-चर ||

 

© श्रीशैल चौगुले

मो. ९६७३०१२०९०.

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “पिंकीचं इंग्लिश…” – कवी : श्री. मंगेश पाडगावकर ☆ प्रस्तुती – डॉ ज्योती गोडबोले ☆

डॉ ज्योती गोडबोले 

? वाचताना वेचलेले ?

☆ “पिंकीचं इंग्लिश…” – कवी : श्री. मंगेश पाडगावकर ☆ प्रस्तुती – डॉ ज्योती गोडबोले ☆

पिंकी इंग्लिश शाळेत जाते,

मी तिला फार भितो…

ती वॉटर ड्रिंक करते,

मी आपला पाणी पितो…

जाडे- जाडे इंग्लिश शब्द,

तिच्या तोंडात उठ- सूट,

माझ्या पायात साधी चप्पल,

तिच्या पायात छान बूट…

 *

ती म्हणाली, केक या शब्दाला,

मराठी शब्द कुठला..?

आता गप्प बसलास ना,

बघ तुला घाम फुटला…

 *

मराठीच्या प्रेमामुळे,

मला गप्प बसवे ना…

इंग्रजीची तिची ऐट,

मला मुळीच ऐकवेना…

 *

मी तिला ताडकन म्हणालो,

वरण- भात आणि पिठले,

यांना तुझ्या इंग्रजीत,

सांग बरं शब्द कुठले..?

 *

हे ऐकून, पिंकी गप्प,

तिला काही सुचेना…

इंग्रजीत पिठले खाईल,

असा शब्द मिळेना…

 *

आता पिंकी घरी गुपचूप,

मराठीत पिठले खाते…

आणि वरण- भातावर,

मराठीतच लिंबू पिळते..!

कवी : श्री मंगेश पाडगावकर

प्रस्तुती : डॉ ज्योती गोडबोले

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ आयुष्याच्या संध्याकाळी… ☆ श्री आशिष बिवलकर ☆

श्री आशिष  बिवलकर

?️?  चित्रकाव्य  ?️?

? आयुष्याच्या संध्याकाळी... ? श्री आशिष  बिवलकर ☆

आयुष्याच्या संध्याकाळी,

ही भिंत फक्त आड आहे |

सरले कित्येक ऊन पावसाळे,

तुझी माझी मैत्री जीवापाड आहे |

*
दोन घरात, दोन अंगणात,

या भिंतीची आडवी रेष आहे |

गात्र जरी थकलीत आपली,

एकमेकांच्या ओढीचा आवेश आहे |

*

उभ्या असलेल्या भिंती पलीकडे,

तुझ्या मैत्रीचा तो विरंगुळा आहे |

हितगुज करतानाचा तुझा माझा,

आठवणींत रमण्याचा नाद खुळा आहे |

*

अवघाची संसार हा केला,

सुखी समाधानी परिवार आहे |

भरल्या ताटावर जरी बसलोत,

खेळीमेळीचे उरले दिवस चार आहे |

*

डोळे जरी पैलतिरी लागलेत,

समवयस्क म्हणून आधार आहे |

पिकलं पान कधी पण गळेल,

हा समज तुझ्यामुळे निराधार आहे |

©️ वास्तवरंग

(चित्र सौजन्य – श्री आशिष बिवलकर) 

© श्री आशिष  बिवलकर

बदलापूर

मो 9518942105

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ समाधान ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

श्री प्रमोद वामन वर्तक  

?️?  चित्रकाव्य  ?️?

? समाधान ?  श्री प्रमोद वामन वर्तक ☆

कोवळी किरणे उन्हाची

पडती पिल्लांच्या अंगावरी,

अंग जणू शेकत बसली 

“दोस्ती मधल्या” कट्ट्यावरी!

*

मधेच थांबवून शेपटीसवे

त्यांचे खेळण्याचे चाळे,

पाहती टकामका मजकडे 

मोठे करून घारे डोळे!

*

बहुदा गेली असेल आई 

भक्ष शोधण्या दारोदारी,

वाट पहात तिची बसली 

खेटून एकमेकां शेजारी!

*

पोज मज दिली छानशी 

विषय मिळाला कवितेला,

लिहिता त्यावर चार ओळी 

झाले समाधान मनाला!

झाले समाधान मनाला!

© प्रमोद वामन वर्तक

संपर्क – दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.) 400610 

मो – 9892561086 ई-मेल – pradnyavartak3@gmail.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ अभंग… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

श्री तुकाराम दादा पाटील

? कवितेचा उत्सव ?

☆ अभंग… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

मुखी नाम घेता घेता

खुले अंतरंग

सखा तेव्हा भेटे मज

माझा पांडुरंग

 *

गाठीभेटी होता होता

घडले संत संग

चंद्रभागे वाळवंटी

भक्तिचाच रंग

 *

टाळविणा झंकारते

वाजतो मृदंग

विठ्ठलच नाचतोय

विठ्ठलाच्या संग

 *

स्वर्ग सुख धरेवरी

होत जाते गुंग

कैवल्याच्या मागणीचा

रंगतो अभंग

 *

द्वैतभाव हरपला

झालो एकसंध

विठ्ठल जागृती

विठ्ठल उमंग

धन्य तुकोबांची गाथा

ज्ञानियांची ज्ञानेश्वरी

नामदेवांचे किर्तन

वारकरी झाले गुंग

© प्रा. तुकाराम दादा पाटील

मुळचा पत्ता  –  मु.पो. भोसे  ता.मिरज  जि.सांगली

सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३

दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares