श्री सुहास रघुनाथ पंडित

? काव्यानंद ?

☆ “उचलला हारा..” – कवयित्री : बहिणाबाई चौधरी – रसग्रहण : अनंत गद्रे ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆


उचलला हारा… बहिणाबाईंची कविता

उचलला हारा, हारखलं मन भारी ।

निजला हार्‍यात, तान्हा माझा शिरीहारी ।।

डोईवर हारा, वाट मयाची धरली ।

भंवयाचा मया, आंब्याखाले उतरली ।।

 *

उतारला हारा, हालकलं माझं मन ।

निजला हार्‍यात, माझा तानका ‘सोपान’ ।।

 *

लागली कामाले, उसामधी धरे बारे ।

उसाच्या पानाचे, हातीपायी लागे चरे ।।

 *

ऐकूं ये आरायी, धांवा धांवा घात झाला ।

अरे, धांवा लव्हकरी, आंब्याखाले नाग आला ।।

 *

तठे धांवत धांवत, आली उभी धांववर ।

काय घडे आवगत, कायजांत चरचर ।।

 *

फना उभारत नाग, व्हता त्याच्यामधीं दंग ।

हारा उपडा पाडूनी, तान्हं खेये नागासंगं ।।

 *

हात जोडते नागोबा माझं वांचव रे तान्हं ।

अरे, नको देऊं डंख, तुले शंकराची आन ।।

 *

आतां वाजव वाजव, बालकिस्ना तुझा पोवा ।

सांग सांग नागोबाले, माझा आयकरे धांवा ।।

 *

तेवढ्यांत नाल्याकडे, ढोरक्याचा पोवा वाजे ।

त्याच्या सूराच्या रोखानं, नाग गेला वजेवजे ।।

 *

तव्हां आली आंब्याखाले, उचललं तानक्याले ।

फुकीसनी दोन्हीं कान, मुके कितीक घेतले ।।

 *

देव माझा रे नागोबा, नही तान्ह्याले चावला ।

सोता व्हयीसनी तान्हा, माझ्या तान्ह्याशीं खेयला ।।

 *

कधीं भेटशीन तव्हां, व्हतील रे भेटी गांठी ।

येत्या नागपंचमीले, आणीन दुधाची वाटी ।।

………

कवितेतल्या मोजक्या काही ओळीत किती सहजपणे एक थरारक प्रसंग उभा केला आहे बहिणाबाईंनी!

यातले काही शब्द भुरळ घालणारे आहेत.

प्रसंगाचे कथन असल्याने व कवितेत सांगायचा आहे म्हटल्यावर जिथून या प्रसंगास सुरवात झाली त्यानेच कवितेची देखील.

‘उचलला हारा’…

डोक्यावरच्या हाऱ्यात बाळ झोपलाय. म्हणून ‘शिरीहारी’. श्रीहरी नाही. किती गोड वाटते ते ऐकायला. अन कविता गातांना मिटर चुकला असते बहुतेक.

अन वाट मयाची धरल्ये. मयाची…म्हणजे मळ्याची.

आंब्याखाली हारा ठेवला. मनात कालवाकालव झाली. त्या बाळाला तसे तिथे एकट्याला सोडून उसाच्या फडात कामाला जातांना.

काम करतांना उसाची धारदार पाती हातापायास चरे पाडत होती.

आणि इतक्यात..

इतक्यात मोठ्या आवाजात ‘आरायी’ म्हणजे आरोळी ऐकू आली “धावा रे धावा! आंब्या खाली नाग निघालाय”

आंब्याखाली नागोबा?????

हे ऐकताच चर्र झाले. अरे देवा हे काय घडतंय. धावंतच पोहोचले आंब्याशी. पहाते तर काय? हारा पालथा पाडून बाळ व नागोबा दोघेही दंग आहेत खेळण्यात! तान्हं खेये नागासंग. अरे बापरे!

 

हात जोडले नागोबाला. शपथ घातली त्याला. तुला शंकराची शप्पथ आहे नागोबा. डंख नको मारू माझ्या सोपानाला.

आणि धावा केला त्या ‘बालकिसना’चा, बाळकृष्णाचा. अरे वाजव तुझा पावा, अन बोलाव त्या नागाला तुझ्याकडे. ऐक रे माझे, वाजव तुझा पावा.

आणि हे मी बोलत्ये तोच…

नाल्यापलिकडून ‘ढोरक्याचा’, म्हणजे गुराख्याच्या बासरीचे सुर ऐकू येवू लागले. आणि मग त्या सुरांच्या जादूने त्या रोखाने नाग निघून गेला.

 

तो निघून जाताच मी धावले आंब्याकडे. तान्ह्याला उचलून घेतले. कवटाळले. कानांत त्याच्या फुंकरले. आणि चटचट मुके घेतले त्याचे.

“नागोबा! मी आजूबाजूस नव्हते. तू त्याला डसला नाहीस. देवच रे बाबा तू. स्वतः तान्हा झालास व माझ्या या तान्ह्यास खेळवलेस.

नागोबा.  होत राहील आपली भेट. आणि हो, येणाऱ्या नागपंचमीला तुझ्याकरता दुधाची वाटी मी येईन घेऊन!”

 

रसास्वाद : अनंत गद्रे

प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित

सांगली 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈


Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted