मनात आलं, मन जड झालं, मन उदास आहे, या वाक्प्रचारांनी आपली भाषा व्यापलेली आहे. कवींनी मनाला हृदयात बसवलं, प्रेमीजनांनी मनाची गाणी गायली, तत्त्वज्ञांनी मनाचे तत्त्व शोधण्याचा प्रयत्न केला. पण खरोखरच मन म्हणजे काय? ते कुठे असते? ते दिसते का? स्पर्श करता येते का? मोजता येते का? या प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न तत्त्वज्ञान, धर्म, आणि विज्ञान या तिन्ही क्षेत्रांतून शतकानुशतके चालू आहे. साध्या भाषेत सांगायचे तर मन म्हणजे विचार, भावना, स्मृती, कल्पना, इच्छा आणि जाणीव यांचा एकत्रित अनुभव. पण हे अनुभव कुठून येतात? आधुनिक न्यूरोसायन्स सांगते की मनाचे मूळ स्थान म्हणजे मेंदू. आपला सुमारे दीड किलो वजनाचा, तीन पौंड इतका, राखाडी-पांढऱ्या रंगाचा, आक्रोडासारखा दिसणारा अवयव म्हणजे मेंदू. मन आणि मेंदू यांचे नाते समजावून घेणे हे आजच्या विज्ञानातील सर्वात कठीण आव्हानांपैकी एक आहे.
प्राचीन काळी मन हृदयात असते असा व्यापक समज होता. प्राचीन इजिप्शियन लोक मृत व्यक्तीचे हृदय जपून ठेवत, पण मेंदू नाकातून काढून फेकून देत. कारण त्यांच्या मते हृदयच विचार करते, आत्मा हृदयात राहतो. अॅरिस्टॉटल या महान ग्रीक तत्त्वज्ञानेदेखील मन हृदयात आहे असे मानले. त्याच्या मते मेंदू हा फक्त रक्त थंड करण्याचे काम करतो! मराठी आणि हिंदी भाषेतही दिलसे सोचो, मनापासून काम करा, हृदयात कुछ कुछ होता है, असे शब्दप्रयोग याच सांस्कृतिक वारशाचे प्रतिबिंब आहेत. भावनिक अनुभव छातीत, हृदयाजवळ जाणवतात, धडधड वाढते, श्वास जड होतो, त्यामुळे हा गैरसमज नैसर्गिकच होता. परंतु हिप्पोक्रेटस (इ. स. पू. ४०० च्या आसपास) आणि नंतर गॅलेन यांनी मेंदूचे महत्त्व ओळखले. मेंदूला दुखापत झाल्यावर माणसाचे वर्तन, विचार, स्मृती बदलतात असे निरीक्षणांती त्यांच्या निदर्शनास आले. तेव्हापासून हळूहळू मेंदू-केंद्रित दृष्टिकोन विकसित होत गेला आणि आज न्यूरोसायन्सने हे निर्विवादपणे सिद्ध केले आहे की मनाचे अस्तित्व मेंदूशी निगडित आहे.
मानवी मेंदूत सुमारे ८६ अब्ज न्यूरॉन्स असतात. प्रत्येक न्यूरॉन हजारो इतर न्यूरॉन्सशी जोडलेला असतो. म्हणजे मेंदूत एकूण सुमारे १०० खर्व सिनॅप्टिक कनेक्शन्स आहेत. हा आकडा इतका प्रचंड आहे की आपल्या आकाशगंगेतील ताऱ्यांच्या संख्येपेक्षाही जास्त आहे. या न्यूरॉन्सच्या जाळ्यातून विद्युत-रासायनिक संदेश सतत प्रवाहित होत असतात आणि त्यातूनच विचार, भावना, स्मृती, निर्णय हे सारे उत्पन्न होतात. मेंदूचे मुख्य भाग म्हणजे सेरेब्रम, सेरेबेलम आणि ब्रेन स्टेम. सेरेब्रमचा बाहेरचा थर म्हणजे सेरेब्रल कॉर्टेक्स, हाच भाग तर्कशक्ती, भाषा, नियोजन, आणि जटिल विचार निर्मितीसाठी जबाबदार आहे. सेरेब्रमला फ्रंटल, पॅरायटल, टेम्पोरल, आणि ऑक्सिपिटल असे चार लोब्स आहेत. प्रत्येकाची वेगळी कार्ये आहेत. फ्रंटल लोब निर्णय घेणे, व्यक्तिमत्त्व आणि भावनिक नियंत्रण यांसाठी; टेम्पोरल लोब स्मृती आणि भाषेसाठी; ऑक्सिपिटल लोब दृष्टीसाठी असे प्रत्येकाचे वेगळे कार्य आहे. लिम्बिक सिस्टिम हा मेंदूचा भाग भावनांशी विशेषतः निगडित आहे. यात अमिग्डाला भय आणि क्रोध यांचे केंद्र आहे आणि हिप्पोकॅम्पस स्मृती निर्माण करण्याचे केंद्र आहे.
मेंदू हा भौतिक अवयव आहे हे मान्य केले, तरी एक मूलभूत प्रश्न अनुत्तरित राहतो तो म्हणजे जाणीव म्हणजे काय? मला ‘मी आहे’ असे जाणवते, मला रंग दिसतात, संगीत ऐकू येते, वेदना होतात, हे व्यक्तिनिष्ठ अनुभव मेंदूच्या न्यूरॉन्सच्या क्रियांमधून कसे उत्पन्न होतात? हे तत्त्वज्ञान आणि विज्ञान या दोन्हींना पडलेले सर्वात कठीण कोडे आहे. तत्त्वज्ञ डेव्हिड चाल्मर्स यांनी याला “The Hard Problem of Consciousness” असे नाव दिले आहे. न्यूरॉन्स कसे काम करतात हे आता वैज्ञानिकांनी सिद्ध केले आहे. पण या क्रियांमधून अनुभव कसा निर्माण होतो हे अजून पूर्णपणे आकळलेले नाही. भौतिक पदार्थातून व्यक्तिनिष्ठ अनुभव कसा उगम पावतो, याचे संपूर्ण वैज्ञानिक उत्तर अद्याप मिळालेले नाही. या प्रश्नावर मुख्यतः दोन भूमिका आहेत — द्वैतवाद आणि भौतिकवाद. रेने देकार्त यांनी मांडलेल्या द्वैतवादानुसार मन आणि शरीर या दोन स्वतंत्र गोष्टी आहेत. त्यांच्या मते मन अभौतिक असते आणि मेंदूशी कसेतरी संपर्क साधते. आधुनिक विज्ञान मात्र प्रामुख्याने भौतिकवादी भूमिका घेते. मन हे मेंदूच्या क्रियांचे उत्पादन आहे. त्याला वेगळे अस्तित्व नाही.
आधुनिक न्यूरोसायन्सने मेंदूचा नकाशा काढून विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात आणि एकविसाव्या शतकात मेंदू संशोधनात क्रांतिकारी प्रगती केली. FMRI (Functional Magnetic Resonance Imaging) या तंत्रज्ञानाने मेंदूचा आतील भाग जिवंत व्यक्तीमध्ये अभ्यासणे शक्य झाले. जेव्हा आपण विचार करतो, भावना अनुभवतो, निर्णय घेतो तेव्हा मेंदूच्या कोणत्या भागात रक्तप्रवाह वाढतो हे FMRI द्वारे दिसते. यावरून मेंदूच्या वेगवेगळ्या कार्यांचा नकाशा तयार झाला आहे.
मन म्हणजे केवळ विचार नाही, तर त्यात स्मृतींचा प्रचंड साठा असतो. ‘मला लहानपणी आजोबा सांगत असत… ‘ हे आठवणे म्हणजे काय? स्मृती कुठे असतात? न्यूरोसायन्सच्या मते स्मृती कोणत्या एका ठिकाणी साठवलेल्या नसतात. त्या मेंदूच्या विविध भागांतील न्यूरॉन्सच्या जाळ्यांमध्ये वितरित असतात. जेव्हा आपण एखादी गोष्ट शिकतो तेव्हा न्यूरॉन्समधील सिनॅप्सेस मजबूत होतात. याला ‘लॉन्गटर्म पोटेन्सीएशन’ म्हणतात. ही प्रक्रिया स्मृतीचा जैविक आधार आहे. हेन्री मोलायसन हे न्यूरोसायन्सच्या इतिहासातील सर्वात प्रसिद्ध रुग्ण. त्यांच्या हिप्पोकॅम्पसची शस्त्रक्रिया झाल्यानंतर ते नवीन दीर्घकालीन स्मृती तयार करू शकेनासे झाले. प्रत्येक भेटीत ते डॉक्टरांना नव्याने भेटल्यासारखे वागत. पण जुन्या आठवणी शाबूत होत्या. कारण त्या इतर भागांत साठवलेल्या होत्या. यावरून हिप्पोकॅम्पस नव्या स्मृती तयार करण्यासाठी अपरिहार्य आहे हे सिद्ध झाले.
मला खूप राग आला आहे, मला प्रेम वाटते, मला भीती वाटते या भावना मेंदूत कुठे निर्माण होतात? लिम्बिक सिस्टिम, विशेषतः अमिग्डाला, भावनिक प्रतिक्रियांसाठी केंद्रीय भूमिका बजावते. धोका जाणवताच अमिग्डाला सेकंदाच्या आधी प्रतिक्रिया देते… लड किंवा पळ असा प्रतिसाद तात्काळ दिला जातो, हृदयाचे ठोके वाढतात, अॅड्रेनालिन वाढते. पण फ्रंटल कॉर्टेक्स या भावनांवर नियंत्रण ठेवतो. म्हणूनच माणूस भावनांच्या आहारी न जाता तर्काने विचार करू शकतो. हे इतर प्राण्यांपेक्षा मानवाचे वैशिष्ट्य आहे. फ्रंटल कॉर्टेक्स नुकसान झालेल्या व्यक्तींमध्ये भावनिक नियंत्रण बिघडते. फिनियस गेज या माणसाच्या प्रसिद्ध ऐतिहासिक प्रकरणात एका अपघातात लोखंडी सळई फ्रंटल लोबमधून आरपार गेली आणि त्या व्यक्तीचे संपूर्ण व्यक्तिमत्त्व बदलले.
अँटोनियो दामासियो या न्यूरोशास्त्रज्ञाने ‘सोमॅंटिक मार्कर हैपोथेसिस’ची मांडणी करून सांगितले की आपले निर्णय केवळ तर्काने नव्हे, तर भावनांनी मोठ्या प्रमाणात प्रभावित होतात. फ्रंटल लोब खराब झालेले रुग्ण तर्काने बरोबर उत्तरे देतात, पण साध्या व्यावहारिक निर्णय घेण्यात अपयशी ठरतात. कारण त्यांचे भावनिक मार्गदर्शन बंद झालेले असते. ‘मी आहे’ हे जाणवणे म्हणजे चेतना. ही जाणीव कुठून येते? मेंदूचे कोणते भाग जागृत असताना आपल्याला जाणीव असते? झोपेत ती जाणीव का नसते? भूल दिल्यावर का नाहीशी होते? न्यूरोशास्त्रज्ञ क्रिस्टॉफ कॉख आणि जुलिओ टोनोनी यांनी इंटिग्रॅटेड इन्फॉर्मशन थेअरी मांडली. त्यानुसार चेतना म्हणजे माहितीचे एकात्मिक प्रक्रियाकरण होय. ते जितके जास्त एकात्मिक, तितकी जास्त चेतना. या सिद्धांतानुसार एक साध्या थर्मोस्टॅटला अतिशय कमी प्रमाणात चेतना असते, तर मानवी मेंदूला सर्वाधिक, हे त्यांनी सिद्ध केले. दुसरा महत्त्वाचा सिद्धांत म्हणजे ग्लोबल वर्क्सस्पेस थेअरी. बर्नार्ड बार्स यांनी मांडलेला. यानुसार चेतना म्हणजे मेंदूतील ग्लोबल वर्कस्पेस जिथे विविध भागांतून माहिती एकत्र येते आणि उपलब्ध होते, जसे रंगमंचावर प्रकाशझोतात आलेला नट. जे विचार/संवेदना या वर्कस्पेसमध्ये येतात त्यांचीच आपल्याला जाणीव होते.
अलीकडे प्रेडिक्टिव्ह प्रोसेसिंग हा सिद्धांत लोकप्रिय होत आहे. हा सिद्धांत कार्ल फ्रिस्टन आणि अँडी क्लार्क यांच्या संशोधनावर आधारित आहे. यानुसार मेंदू हे भाकीत ओळखणारे मशीन आहे, तो सतत आपल्या अनुभवाचे भाकीत करत असतो आणि इंद्रियांकडून येणाऱ्या माहितीशी ते जुळवत असतो. जे जुळत नाही तेच आपल्याला जाणवते. म्हणजेच आपण जग जसे आहे तसे पाहत नाही तर मेंदूने बनवलेले अंदाजित जग पाहतो! फ्रॉइडने नेणिवेतील मनाची संकल्पना मांडली होती. आपल्या वर्तनावर आणि भावनांवर नेणिवेतील इच्छा आणि भीती प्रभाव टाकतात असे त्यांनी सांगितले. आधुनिक न्यूरोसायन्सने नेणिवेतील प्रक्रियांचे अस्तित्व वेगळ्या पद्धतीने सिद्ध केले आहे. मेंदूत बहुतांश माहितीचे प्रक्रियाकरण जाणीवेच्या बाहेर होते. आपण सायकल चालवतो, टायपिंग करतो, या क्रिया स्वयंचलितपणे होतात. त्यासाठी जाणीवेची गरज नसते. बेंजामीन लिबेट यांच्या प्रसिद्ध प्रयोगात असे दिसले की एखादी क्रिया करण्याचा जाणीवपूर्वक निर्णय होण्याआधी मेंदूत त्याची विद्युत जोडणी सुरू होते.
एकेकाळी असे मानले जात होते की मेंदू एकदा पूर्ण विकसित झाला की बदलत नाही. पण आधुनिक संशोधनाने हा समज खोटा ठरवला आहे. न्यूरोप्लास्टिसिटी म्हणजे मेंदू नवीन अनुभव, शिक्षण, आणि सरावाने स्वतःची रचना बदलू शकतो. लंडनच्या टॅक्सी ड्रायव्हरांचा प्रसिद्ध अभ्यासात असे लक्षात आले की त्यांचा हिप्पोकॅम्पस सामान्य माणसांपेक्षा मोठा होता, कारण त्यांना लंडनच्या गुंतागुंतीच्या रस्त्यांची सखोल माहिती असते. ध्यानधारणा करणाऱ्यांच्या मेंदूत संरचनात्मक बदल दिसतात, त्यांचा फ्रंटल कॉर्टेक्स घट्ट होतो, अमिग्डालाची प्रतिक्रियाशीलता कमी होते. याचाच अर्थ मानसिक सराव मेंदूला शब्दशः बदलतो.
एक गमतीचा भाग म्हणजे मन समजण्याच्या प्रयत्नातून AI म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्तेचा जन्म झाला. मेंदूच्या न्यूरल नेटवर्कची नक्कल करून कृत्रिम न्यूरल नेटवर्क बनवण्यात आले. आज चॅटजीपीटी, क्लाऊड, जेमिनीसारखे AI मॉडेल्स भाषा समजतात, उत्तरे देतात, पण त्यांच्यात जाणीव असते का? ते खरोखर विचार करतात का? हे प्रश्न अजून अनुत्तरित आहेत. जे काही निश्चित आहे ते म्हणजे आजचे AI मॉडेल्स मानवी मनाची प्रतिकृती नाहीत. मानवी मन केवळ माहितीवर प्रक्रिया करत नाही, तर त्याला शरीर आहे, भावना आहेत, जाणीव आहे, उत्क्रांतीचा इतिहास आहे. या सर्व गोष्टी मिळून मन बनते. मनाते शरीराचे अविभाज्य नाते असते. म्हणून मन फक्त मेंदूत नाही असेही काही संशोधक सुचवतात. देहाधारीत जाणीव या नव्या दृष्टिकोनानुसार विचार आणि अनुभव हे संपूर्ण शरीराशी निगडित असतात. आतड्याला दुसरा मेंदू म्हणतात. कारण त्यात ५०० मिलियन न्यूरॉन्स आहेत आणि ते सेरोटोनिन सारखे न्यूरोट्रान्समीटर तयार करतात. आतड्याचे आणि मेंदूचे सतत संभाषण चालू असते.
मन म्हणजे काय याचे उत्तर विज्ञानाने अनेक पातळ्यांवर द्यायला सुरुवात केली आहे. न्यूरॉन्स, सिनॅप्स, न्यूरोट्रान्समीटर्स, मेंदूचे विविध भाग यांचे कार्य आता बऱ्याच अंशी समजले आहे. fMRI, EEG, ऑप्टोजेनेटिक्स, आणि कृत्रिम बुद्धिमत्ता यांच्या मदतीने संशोधन वेगाने पुढे जात आहे.
पण ‘जाणीव’, ‘मी आहे’ हे अनुभवणे अजून पूर्णपणे उलगडलेले नाही. हे खरे रहस्य आहे. मेंदूतील विद्युत-रासायनिक प्रक्रियांमधून अनुभव कसा उत्पन्न होतो हे समजणे हे एकविसाव्या शतकाचे सर्वात मोठे वैज्ञानिक आव्हान आहे. मन हे हृदयात नाही हे आता निश्चित झाले आहे. ते मेंदूत आहे, पण मेंदूच्या एका कोपऱ्यात नव्हे, तर संपूर्ण मेंदूच्या आणि कदाचित संपूर्ण शरीराच्या गुंतागुंतीच्या क्रियांमध्ये विखुरलेले आहे. मन ही एक सतत बदलणारी, शिकणारी, जुळवून घेणारी प्रक्रिया आहे. आणि हीच प्रक्रिया समजणे म्हणजे स्वतःला समजणे. तरीही कवींनी मनाला जे गूढ दिले ते नाहीसे झालेले नाही. विज्ञानाने त्या गूढाची खोली आणखी वाढवली आहे. आपण मेंदू जितका समजतो तितका आपल्याला तो अधिक अद्भुत वाटतो. आणि म्हणूनच मनाचा शोध हा विज्ञानातील सर्वात रोमांचक प्रवास आहे.
ऑफिसमधून रोजच्या वेळेपेक्षा लवकर निघून सुभाष मित्राच्या जनरल स्टोअरवर गेला.
“या कौन्सिलर, घरस्फोटाची भांडणं सोडवून झाली का?”बापूनं स्वागत केलं.
“गप रे, का उगाच छळतोस. जाम वैतागलोय”
“आज जास्त केसेस होत्या वाटतं”
“एकच होती. सगळा दिवस खाल्ला. सुशिक्षित जोडपं पण धुमाकूळ घातला. लग्नाला दोनच वर्ष झालेली पण एकमेकांविषयी पराकोटीचा द्वेष. जोरजोरात भांडत होते. लग्नाचं कर्ज अजून फिटलं नाही तोपर्यंत घटस्फोटाची वेळ आली. दोघांचाही ‘ईगो’ खूप स्ट्रॉंग. खूप समजावलं पण पालथ्या घड्यावर पाणी… ”
“या असल्या गोष्टी तू कधीपासून मनावर घ्यायला लागला. त्यांचं ते बघतील. ”
“इमोशनली विचार करतोयेस. याकडं फक्त नोकरी म्हणून बघ. ”
“इतकी वर्ष तेच तर करतोय तरीही त्रास होतॊ. सततच्या कटकटींचा आणि नकरात्मकतेचा परिणाम होतोच. नातं जोडण्याची जेवढी घाई तशीच तोडण्याची सुद्धा. आयुष्यभर सोबत असणारं जोडपी जगात नाहीत असं वाटायला लागलं. ”दोघं बोलत असताना एक वयस्कर जोडपं झेरॉक्ससाठी दुकानात आलं.
“दर येळेला नवीन कायीतरी मागत्यात” चिडलेले आजोबा पेपर पुढे करत म्हणाले.
“सरकारी काम आहे. कागदपत्र द्यावीच लागतात. ”बापू.
“ते बी खरं हाय. कोर्टाची पायरी चढलीये आता दम लागला तरी थांबता येणार नाही. ”
“तुमची जोडी भारीये” बापू म्हणाला तेव्हा आजीबाईंनी नाक मुरडलं.
“तर वो, माजी हिरोविन तवा बी झ्याक व्हती आणि आता बी.. अजूनही तिच्या गालावरची खळी… ”आजोबांनी आजीकडे पाहत डोळे मिचकावले तेव्हा आजी चक्क लाजली. अहाहा!! ते “लाजणं” फारच मनमोहक होतं.
“ए बाबा, आपलं काम कर. ते कागद दे. ”आजीनं विषय बदलला.
“कायची यवडी घाई, घरी तरी काय काम हाय. होऊ दे निवांत”आजोबा
“सारखं यायला लागतंय ते बरंच हाय की.. या निमित्तानं नवरा-बायकोला फिरता येतेय, बोलता येतेय. ”बापू म्हणाला तेव्हा “या बया… ”म्हणत आजीनं कपाळावर हात मारला.
“ह्ये माज्या ध्यानातच आलं नाही. घरच्या गोतावळ्यात म्हातारीशी धडं बोलणं व्हत नाही. ही आयडिया बेस्ट!!आता लागू दे कितीबी येळ, फिकीर नाई. रोज येऊ. मस्त मजा करू”आजोबांनी म्हटल्यावर आजीच्या चेहऱ्यावर उमटलेले “भाव” लाजवाब. काही वेळानं आजी आजोबा निघून गेले. एकाच दिवशी टोकाचे अनुभव घेतलेला सुभाषचा मूड एकदम फ्रेश झाला. नाती तोडणं सोप्पंयं पण खरा आनंद ती टिकवण्यात आहे.
☆ सवयी एडिट करण्याची वेळ – – – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – अंजली दिलीप गोखले ☆
खरे तर रोज सकाळी शेकडो, हजारो “सुप्रभात” संदेश आपल्या मोबाईलवर येत असतात.
बहुतेक संदेश वाचले जातात,
काही फक्त पाहिले जातात आणि
काही नकळत पुढे सरकून जातात. .
पण
आज एका मैत्रिणीने पाठवलेला एक छोटासा संदेश मनात घर करून गेला.
“Reached that age
where I don’t care
how I look in photos anymore…
I want to look good
in the X-rays, scans
and blood reports!”
पहिल्यांदा वाचला तेव्हा हसू आलं. अगदी मिश्किल वाटलं. पण काही क्षणांनी त्यामागचा अर्थ मनाला स्पर्शून गेला.
आणि मग विचारांची एक साखळीच सुरू झाली.
खरंच ना…
एक काळ असा होता की
फोटो काढण्यापूर्वी केस नीट आहेत का, चेहरा कसा दिसतोय, कोणता अँगल चांगला दिसेल,
कोणता फिल्टर वापरावा
याची काळजी असायची.
आजही वाटते म्हणा… पण पूर्वीसारखी नाही.
आता आयुष्य अशा टप्प्यावर येऊन पोहोचलं आहे की
फोटोमध्ये आपण कसे दिसतो यापेक्षा
एक्स-रे, स्कॅन आणि ब्लड रिपोर्ट
मध्ये काय दिसतं, याची जास्त काळजी वाटते.
हे वयामुळे नाही, तर अनुभवामुळे घडतं.
एक काळ असा होता की फोटोवर किती लाईक्स आले, कोणती कमेंट आली याला महत्त्व होतं. पण
जसजसं आयुष्य शिकवत जातं, तसतसं लक्षात येतं की
खरी गुंतवणूक आपल्या आरोग्यात असते. .
कारण फोटोवरील सुरकुत्या लपवता येतात,
पण थकलेलं शरीर लपवता येत नाही.
आपण सगळेच रोजच्या धावपळीत इतके अडकून जातो की
स्वतःसाठी वेळ काढणं
पुढे ढकलत राहतो.
पाणी कमी पिणं, झोप अपुरी घेणं, वेळेवर न खाणं, व्यायाम टाळणं, मनातला ताण साठवत राहणं… आणि मग एक दिवस रिपोर्ट आपल्याला आरशापेक्षा जास्त प्रामाणिकपणे सत्य दाखवतो. .
मात्र त्यात घाबरण्यासारखं
काही नाही.
उलट ही एक जाग येण्याची घंटा असते. .
खरं तर निरोगी राहण्याचं गणित फार अवघड नाही—
थोडं जास्त पाणी,
थोडी जास्त हालचाल,
थोडी चांगली झोप,
थोडं कमी चिंतन,
आणि स्वतःवर थोडं अधिक प्रेम.
आजकाल माझी इच्छा एवढीच आहे…
फोटोमध्ये मी परफेक्ट दिसले नाही तरी चालेल.
पण डॉक्टरांनी रिपोर्ट पाहून,
“सगळं व्यवस्थित आहे, ”
असं हसत सांगावं.
कारण शेवटी आयुष्य हे
फोटोमध्ये कसं दिसतं यावर नाही,
तर ते किती निरोगी, आनंदी
आणि मनापासून जगता येतं
यावर ठरतं. .
आणि हो…
आता फोटो एडिट करण्यापेक्षा सवयी एडिट करण्याची वेळ आली आहे!
फोटोवर लाईक्स मिळणं आनंददायी असतं,
पण रिपोर्टवर डॉक्टरांनी
“छान आहे!” म्हणणं त्याहून सुंदर असतं.
मैत्र हो स्वतःची काळजी घ्या ; निरोगी रहा.
लेखक : अज्ञात
प्रस्तुती : अंजली गोखले
मो ८४८२९३९०११
≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
आज सकाळी नेहमीप्रमाणे गॅलरीत उभी राहून मी आकाशाकडे पाहत होती… उन्हाळ्याची तीव्रता अजूनही वातावरणात जाणवत होती. सूर्याने आपले प्रखर तेज सर्वदूर पसरवले होते आणि निळ्याशार आकाश निरभ्र दिसत होते. झाडांची पाने निश्चल होती… पक्ष्यांचा किलबिलाटही मंदावला होता आणि धरती जणू एखाद्या दीर्घ प्रतीक्षेत मग्न होती… अशा शांत आणि स्थिर वातावरणात माझी नजर अचानक आकाशाच्या एका कोपऱ्याकडे वळली. तिथे एक काळा ढग दिसला.
तो ढग आकाराने फार मोठा नव्हता परंतु त्याच्या अस्तित्वाने संपूर्ण आकाशाचे स्वरूप बदलून गेले होते. अथांग निळाईच्या मध्यभागी तो एखाद्या कवीच्या अंतर्मनातील गूढ भावनेप्रमाणे तरंगत होता… त्याचा काळसर रंग आकाशाच्या शुभ्रतेशी एक सुंदर विरोधाभास निर्माण करीत होता. त्याच्या कडा सूर्यकिरणांनी उजळल्या होत्या त्यामुळे त्या ढगाभोवती एक प्रकारचे तेजस्वी वलय निर्माण झाले होते… तो ढग पाहताना असे वाटत होते की निसर्गाने आपल्या विशाल कॅनव्हासवर एक अर्थपूर्ण रेषा उमटवली आहे.
वाऱ्याची मंद झुळूक वाहू लागली आणि तो ढग संथ गतीने पुढे सरकू लागला. त्याच्या हालचालींमध्ये एक प्रकारचा आत्मविश्वास होता. तो कुठल्याही घाईत नव्हता जणू त्याला आपल्या प्रवासाचे उद्दिष्ट माहीत होते. त्या काळ्या ढगाकडे पाहताना माझ्या मनात अनेक विचार उमटू लागले… जीवनातही काही प्रसंग असेच अचानक समोर येतात.. ते सुरुवातीला काळ्या ढगांसारखे वाटतात परंतु त्यांच्याच आगमनातून नव्या शक्यता निर्माण होतात…
तो ढग पाहताच बालपणीच्या आठवणी मनात तरळू लागल्या. पावसाळ्याच्या सुरुवातीला आकाशात असेच काळे ढग जमले की आम्ही मित्र मैत्रीणी आनंदाने घराबाहेर पळत असू… पहिल्या सरीची आतुरतेने वाट पाहत असू… पावसाच्या पाण्यात कागदी होड्या सोडणे, चिखलात खेळणे आणि आईच्या हाकेकडे दुर्लक्ष करून भिजत राहणे हे सारे क्षण पुन्हा डोळ्यांसमोर उभे राहिले. त्या एका ढगाने स्मृतींच्या दालनातील कितीतरी बंद दरवाजे उघडले होते.
काळा ढग हा केवळ पावसाचा सूचक नसतो तो आशेचा संदेशवाहक असतो. उन्हाने करपलेल्या धरतीला तो नवजीवनाची हमी देतो. शेतकऱ्याच्या डोळ्यांतील प्रतीक्षेला तो अर्थ देतो. कोरड्या विहिरी, तहानलेली झाडे आणि उष्णतेने व्याकूळ झालेली सृष्टी त्याच्या आगमनाने सुखावते. म्हणूनच त्या ढगाकडे पाहताना मला वाटले की निसर्गातील प्रत्येक गोष्ट माणसाला काहीतरी शिकवत असते. कठीण परिस्थिती कितीही दीर्घकाळ टिकली तरी तिचा अंत निश्चित असतो.
थोड्याच वेळात त्या ढगाने आकाशात आपला विस्तार वाढवला. त्याच्या सावलीने परिसरातील प्रकाश मऊ झाला. वातावरणात गारव्याची चाहूल लागली. झाडांच्या पानांत कुजबुज सुरू झाली. पक्षी अधिक चैतन्याने उडू लागले. जणू संपूर्ण निसर्ग त्या ढगाच्या स्वागतासाठी सज्ज झाला होता. त्यावेळी मला जाणवले की परिवर्तनाची सुरुवात अनेकदा अशाच सूक्ष्म संकेतांनी होत असते. एका छोट्याशा ढगातून मोठ्या वर्षावाची शक्यता दडलेली असते.
आज आकाशात दिसलेल्या त्या काळ्या ढगाने मला जीवनाचे एक सुंदर तत्त्व शिकवले. बाह्यतः काळोख वाटणाऱ्या गोष्टींच्या अंतरंगातही सृजनाची शक्ती दडलेली असते. काळा ढग दिसतो तेव्हा आपण पावसाची आशा करतो त्याचप्रमाणे संकटे आली की त्यातून उगवणाऱ्या नव्या संधींचीही अपेक्षा ठेवली पाहिजे कारण निसर्गाप्रमाणेच जीवनातही प्रत्येक अंधारानंतर प्रकाश येतो… प्रत्येक प्रतीक्षेनंतर आनंद येतो आणि प्रत्येक काळ्या ढगानंतर जीवनदायी पाऊस बरसतो त्यामुळे आज दिसलेला तो एकमेव काळा ढग माझ्यासाठी केवळ निसर्गदृश्य नव्हता तर आशा, परिवर्तन आणि नवचैतन्य यांचे सुंदर प्रतीक होता…
☆ श्री रविंद्रनाथ टागोर यांची “गीतांजली”… भाग – २९ ☆ डॉ. शोभना आगाशे ☆
श्री रविंद्रनाथ टागोर
नोबेल पुरस्कार समितीने दिलेल्या मानपत्रात टागोरांविषयी लिहिले आहे की, “रविंद्रनाथ टागोर यांच्या अत्यंत संवेदनशील, मनोवेधक, वेगळ्या धाटणीच्या व परिपूर्ण अशा काव्यरचनांनी त्यांनी इंग्रजी साहित्य विश्वाला त्यांच्या अनोख्या काव्यात्म विचारांनी समृद्ध केले आहे. ” तर इकडे टागोरांना असं वाटलं की, “या पुरस्कारामुळे एकमेकांना अपरिचित असलेल्या संस्कृती, विश्वबंधुत्वाच्या भावनेने जवळ आल्या. “
रविंद्रनाथ १९१२ च्या सुरवातीला बरेच आजारी होते त्यामुळे त्यांची आधीच ठरलेली लंडन ट्रिप त्यांना पुढे ढकलावी लागली. त्याऐवजी ते हवाबदलासाठी त्यांच्या पद्मा नदीच्या किनाऱ्यावरील शिलादोह येथील वडिलोपार्जित घरी राहायला गेले. तिथं त्यांनी त्यांच्या काही बंगाली कवितांचा इंग्रजीत अनुवाद केला. त्यांनी एका खाजगी पत्रात आपण हा अनुवाद, का व कसा केला याविषयी लिहिलं आहे. ते म्हणतात, ” हा शब्दश: अनुवाद नाही तर या कवितांचा हा पुनर्जन्म आहे. मी यातून पुनश्च एकदा नवनिर्मितीचा अनुभव घेतला. ” इंग्रजी रचनेसाठी सोईस्कर असा गद्य काव्य प्रकार त्यानी यासाठी निवडला व त्यांना हा काव्यसंग्रह व्हायला नको होता तर ती एक काव्य मालिका व्हायला हवी होती.
नंतर कांही महिन्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्याने, इंग्लंडला बोटीने जाण्यासाठी ते निघाले या प्रवासात त्यांनी आणखी काही कवितांचे इंग्रजी भाषांतर केलं. लंडनला गेल्यावर ते त्यांचे चित्रकार मित्र रोथेन्स्टाइन यांना भेटले व रोथेन्स्टाइन यांनी त्यांची व त्यांच्या काव्याची ओळख लंडनच्या आपल्या नामांकित मित्र परिवाराला करून दिली. यात डब्ल्यू. बी. यीट्स होते तसेच थॉमस मूर, इजा पाऊंड, ब्रुक इत्यादि अनेक सुप्रसिद्ध व्यक्ती होत्या. त्या सर्वांना टागोरांच्या गूढ, अप्रतिम व नाविन्यपूर्ण काव्याने प्रभावित केले.
यीट्स् यांनी या भाषांतरीत कवितांमधून निवडक १०३ कवितांचे पुस्तक काढण्याचा आग्रह धरला. रोथेन्स्टाइन यांच्यामुळे ‘इंडिया सोसायटी ऑफ लंडन’ यांनी या कवितांचे पुस्तक छापले. या पुस्तकाचे इंग्रजी वाचकांनी खूपच उत्साहाने स्वागत केले व या पुस्तकाची दुसरी आवृत्ती छापण्यासाठी मॅकमिलन प्रेस ऑफ लंडन पुढे आली. अवघ्या नऊ महिन्याच्या कालावधीत या पुस्तकाच्या दहा आवृत्त्या निघाल्या. केवळ रोथेन्स्टाइन यांच्यामुळे हे सर्व शक्य झाले म्हणूनच टागोरांनी हे पुस्तक रोथेन्स्टाइन यांनाच अर्पण केले आहे. यीट्स् यांना तर या कवितांनी इतकं भारून टाकलं होतं की त्यांनी आपण होऊन या पुस्तकाला प्रदीर्घ प्रस्तावना लिहिली.
या पुस्तकातल्या सहा कविता ‘पोएट्री’ या अमेरिकन मासिकात प्रसिद्ध झाल्या व त्यांचे तिथे अनेक नियतकालिकांमधून खूप कौतुकही झाले.
यानंतर रॉयल सोसायटी ऑफ लिटरेचर चे सदस्य असलेले ब्रिटिश साहित्यिक थॉमस मूर यांनी नोबेल पुरस्कारासाठी रवींद्रनाथांचे नाव पुरस्कृत केलं व हॉल स्टाॅर्म व इतर महानुभावांनी त्याला अनुमोदन दिले. एकूण २८ नामांकनांमधून टागोरांचं नाव सर्व संमत झालं. तारेने ही बातमी टागोरांना कळविण्यात आली, जी टागोरांना २२ नोव्हेंबर १९१३ रोजी मिळाली. संपूर्ण शांती निकेतन या बातमीने हर्षभरीत झालं व २३ नोव्हेंबरला तिथे टागोरांचा भव्य सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला जगदीशचंद्र बोस प्रमुख पाहुणे होते. सुमारे पाचशे उत्साहित प्रशंसकांना घेऊन एक खास रेल्वे गाडी कलकत्त्याहून बोलपूरला म्हणजे शांतीनिकेतनला या कार्यक्रमासाठी आली.
नोबेल पुरस्कार सोहळ्याला स्वीडन येथे वेळेत पोहोचू शकत नसल्यामुळे, समारंभाला टागोर उपस्थित राहू शकले नाहीत. मात्र त्यांनी पाठविलेले लिखित भाषण समारंभात वाचून दाखविण्यात आले.
नंतर तो पुरस्कार व मानपत्र २७ जानेवारी १९१४ रोजी बंगालचे गव्हर्नर लॉर्ड कारमिशेल यांच्या मार्फत राजभवनात टागोरांना समारंभ पूर्वक दिले गेले.
—–
☆ गीत : ८५ ☆
WHEN the warriors came out first from their master’s hall, where had they hid their power? Where were their armour and their arms?
They looked poor and helpless, and the arrows were showered upon them on the day
they came out from their master’s hall.
When the warriors marched back again to their master’s hall where did they hide their power?
They had dropped the sword and dropped the bow and the arrow; peace was on their
foreheads, and they had left the fruits of their life behind them on the day they marched back again to their master’s hall.
IN desperate hope I go and search for her in all the corners of my room; I find her not.
My house is small and what once has gone from it can never be regained. But infinite is
thy mansion, my lord, and seeking her I have come to thy door. I stand under the golden canopy of thine evening sky and I lift my eager eyes to thy face.
I have come to the brink of eternity from which nothing can vanish ⎯ no hope, no
happiness, no vision of a face seen through tears.
Oh, dip my emptied life into that ocean, plunge it into the deepest fullness.
Let me for once feel that lost sweet touch in the allness of the universe.
“व्यसन भविष्यातील परिणामांचा विचार करण्याची क्षमता दाबून टाकते. जेव्हा डोपामिनची लालसा जुनी (Chronic) होते, तेव्हा मेंदू भविष्यातील परिणामांपेक्षा तात्कालिक बक्षिसाला जास्त महत्त्व देऊ लागतो. म्हणूनच व्यसनी लोक शेवटी करिअर, कुटुंबे, प्रतिष्ठा आणि काहीवेळा संपूर्ण देश उद्ध्वस्त करतात. “
काही महिन्यांनंतर विक्रम तुरुंगात एकटाच बसला होता. तिथे कोणतेही टीव्ही कॅमेरे नव्हते, राजकारणी नव्हते, अनुयायी नव्हते आणि हार नव्हते, फक्त शांतता होती.
तब्बल वर्षांनंतर त्याच्या मेंदूला ‘विथड्रॉल’चा (Withdrawal) सामना करावा लागत होता—सत्तेचा विथड्रॉल, प्रसिद्धीचा विथड्रॉल आणि विलासितेचा विथड्रॉल.
त्याच्या मनामध्ये जुन्या आठवणी पुन्हा ताज्या झाल्या—त्याचे गरीब गाव, त्याच्या वडिलांचे बलिदान आणि त्याचे सुरुवातीचे आदर्श.
त्याच्या डोळ्यातून हळूहळू अश्रू वाहू लागले.
दुसऱ्या एका कैद्याने उपहासाने विचारले, “कलेक्टर साहेब, कुठे गेली तुमची सत्ता?”
विक्रमने खाली पाहिले.
एक भयानक सत्य त्याच्या मनात अचानक प्रकाशून गेले—त्याने सत्तेवर कधीच नियंत्रण ठेवले नव्हते, तर सत्तेनेच त्याला नियंत्रित केले होते.
बाहेरचा पाऊस थांबला होता. रोहन बराच वेळ शांत राहिला. शेवटी त्याने विचारले, “समाज हे व्यसन थांबवू शकतो का?”
डॉ. देशमुख हळूहळू एका मोठ्या लाकडी कपाटाकडे गेले आणि त्यांनी एक निळी फाईल काढली, ज्यावर शीर्षक होते:
“हे, ” ते मऊ स्वरात म्हणाले, “येणाऱ्या महामारीपासून मानवता स्वतःचे रक्षण करू शकणाऱ्या मोजक्या मार्गांपैकी एक असू शकते. “
ते पुन्हा खाली बसले आणि बोलू लागले.
“शताब्द्यांपासून आपण शरीरासाठी व्यायामशाळा (Gymnasiums) बांधल्या. आपण स्नायू मजबूत केले, स्टॅमिना वाढवला आणि शारीरिक सहनशक्ती विकसित केली, परंतु आपण लोभ, फेरफार (Manipulation), भावनिक आवेग, अहंकार आणि विनाशकारी लालसेविरुद्ध मेंदूला मजबूत करण्यासाठी कधीही यंत्रणा तयार केली नाही. “
रोहन शांतपणे ऐकत होता.
डॉ. देशमुखांनी फाईल उघडली. आत मेंदूचे नकाशे आणि आकृत्या होत्या.
“समस्या ही आहे, ” ते म्हणाले, “की मानवी संस्कृती बौद्धिकदृष्ट्या प्रगत झाली आहे, परंतु भावनिकदृष्ट्या अप्रशिक्षित राहिली आहे. आपण मुलांना स्पर्धा कशी करावी, कसे यशस्वी व्हावे, कसे कमवावे, परीक्षांवर कसे वर्चस्व गाजवावे आणि कसे प्रसिद्ध व्हावे हे शिकवतो, परंतु आपण त्यांना इच्छेवर नियंत्रण कसे ठेवावे, अपयश कसे सहन करावे, प्रलोभनांचा प्रतिकार कसा करावा, डोपामिन-प्रेरित आवेगांवर कसे नियंत्रण ठेवावे आणि यशानंतरही मानसिकदृष्ट्या स्थिर कसे राहावे हे कधीच शिकवत नाही. “
त्यांनी मेंदूच्या आकृतीकडे बोट दाखवले.
“प्रिफ्रंटल कॉर्टेक्स ही मेंदूची ‘नैतिक ब्रेक सिस्टीम’ आहे, तर लिंबिक रिवॉर्ड सर्किट्स हे ‘अॅक्सिलेटर’ आहेत. अनेक यशस्वी लोकांमध्ये अॅक्सिलेटर खूप शक्तिशाली होतो, तर ब्रेक सिस्टीम कमकुवत राहते आणि हा असमतोल धोकादायक व्यक्तिमत्त्वे निर्माण करतो. “
रोहनने शांतपणे विचारले, “आणि ‘ब्रेन जिम्नॅशियम’ हे दुरुस्त करते?”
“हो, ” डॉक्टरांनी उत्तर दिले. “तीच तर मूळ कल्पना आहे. “
ते हळूहळू पुढे सांगू लागले.
“जरा विचार कर, जर शाळा, महाविद्यालये, प्रशासकीय अकादमी, राजकीय संस्था, कॉर्पोरेट संस्था आणि अगदी कोचिंग इन्स्टिट्यूट्समध्येही संरचित न्यूरोकोग्निटिव्ह (Neurocognitive) प्रशिक्षण सुरू केले—कोणतीही धार्मिक प्रवचने किंवा नैतिक पोलिसांसारखी जबरदस्ती नाही, तर पूर्णपणे वैज्ञानिक मेंदूचे प्रशिक्षण. “
“म्हणजे ब्रेन जिम्नॅशियम लसीकरणासारखं (Vaccination) काम करेल?”
वृद्ध न्यूरोलॉजिस्ट हसले.
“अगदी बरोबर. प्रत्येक संसर्ग पूर्णपणे रोखता येत नाही, परंतु प्रतिकारशक्ती नक्कीच वाढवता येते. “
ते पुढे म्हणाले.
“जेव्हा वारंवार संज्ञानात्मक (Cognitive) प्रशिक्षण फ्रंटल लोब सर्किट्सना मजबूत करते, तेव्हा व्यक्तींमध्ये आवेगांवर उत्तम नियंत्रण, सुधारित भावनिक नियमन, सक्तीची लालसा कमी होणे, मजबूत नैतिक निर्णयक्षमता आणि सामाजिक फेरफारांविरुद्ध जास्त प्रतिकारशक्ती विकसित होते. न्यूरोप्लास्टिसिटी (Neuroplasticity) स्वतः या शक्यतांना पाठिंबा देते, कारण मेंदूला प्रशिक्षित केले जाऊ शकते. “
खोलीत शांतता पसरली होती.
आता फक्त घड्याळाचा टिक-टिक आवाज ऐकू येत होता.
डॉ. देशमुख आपल्या खुर्चीवर मागे टेकले.
“आजचा समाज अति-उद्दीपनाचा (Hyperstimulation) उत्सव साजरा करतो. सोशल मीडिया सतत डोपामिनचे इंजेक्शन देत असतो, न्यूज चॅनेल्स केवळ प्रसिद्धीला मोठे करतात, राजकीय व्यवस्था फेरफार करणाऱ्यांना बक्षीस देते, कॉर्पोरेट व्यवस्था आक्रमकतेला प्रोत्साहन देते आणि शैक्षणिक व्यवस्था भावनिक परिपक्वतेशिवाय केवळ कामगिरीला (Performance) महत्त्व देते. “
त्यांनी एक मोठा श्वास घेतला.
“आपण भावनिकदृष्ट्या कमकुवत नियंत्रण यंत्रणा असलेले, बौद्धिकदृष्ट्या शक्तिशाली मेंदू तयार करत आहोत. “
रोहनने हळूच टीव्ही स्क्रीनकडे पाहिले ज्यावर अजूनही भ्रष्टाचार आणि घोटाळ्याच्या ठळक बातम्या फ्लॅश होत होत्या.
“तर मग या अटक झालेल्या घटना वेगवेगळ्या किंवा वेगळ्या स्वरूपाच्या नाहीत?”
“नाही, ” डॉक्टरांनी शांतपणे उत्तर दिले. “ही लक्षणे आहेत, एका अति-उद्दीपित संस्कृतीची (Overstimulated civilization) लक्षणे. “
☆ “संतांची चरित्रे” – पुस्तकांचा संच लेखक : माधवराव आप्पाजी मुळे / ल. रा. पांगारकर ☆ परिचय – श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆
पुस्तक : संतांची चरित्रे – ४ पुस्तकांचा संच.
१. श्री नामदेव चरित्र : रू. २५०/-
२. श्री ज्ञानेश्वर महाराज चरित्र आणि ग्रंथ विवेचन : रू. २००/-
३. संत तुकाराम चरित्र : रू २५०/-
४. एकनाथ चरित्र : रू २००/-
सव्वाशे वर्षे झाली या संतांच्या चरित्रांना प्रकाशित होऊन! माधवराव आप्पाजी मुळे आणि ल. रा. पांगारकर यांनी १२५ वर्षांपूर्वी लिहिलेले चार संतांचे चरित्र:
पुस्तक पहिले
संत नामदेव महाराज चरित्र !
लेखक: माधवराव आप्पाजी मुळे
पृष्ठ:२५६
औंढा नागनाथ मंदिर ज्यांच्यासाठी स्वतःची दिशा बदलून घेते, ज्यांच्या रचना गुरू ग्रंथ साहेब मध्ये समाविष्ट आहेत, ज्यांच्या दर्शनासाठी जगभरातून शीख बांधव नरसी येथे येतात, अशा संत श्रेष्ठ नामदेव महाराजांचे हे चरित्र!
ज्ञानदेवें रचिला पाया । उभारिले देवालया ।।
नामा तयाचा कंकर । तेणे केला हा विस्तार ।।
जनार्दन एकनाथ । खांब दिला भागवत ।।
तुका झालासे कळस । भजन करा सावकाश ।।
बहेणी फडकते ध्वजा । निरुपण आले ओजा ।।
संत बहिणाबाई यांनी लिहिलेला अभंग महाराष्ट्रीय संताचे कार्याचे यथार्थ वर्णन करणारे आहे. संत ज्ञानेश्वर यांनी वारकरी पंथाला सुसंघटित केलं. त्याचा पाया घातला…. पण त्याला विस्तृत करण्याचे कार्य मात्र संत नामदेवांनी केलं. हे तत्वज्ञान भारतभर जावे म्हणून देशाटन केलं. संत बहिणाबाई नामदेव महाराज यांना बांधकाम पूर्ण करणारा, त्याला आकार देणारा किंकर म्हणून त्यांचा उल्लेख करतात. संत ज्ञानदेव आणि संत नामदेव यांच्या मध्ये जो स्नेहभाव होता तो वाचताना आपल्याला कळवळून आले नाही तर नवल! अकृत्रिम प्रेम काय असते? संत संगत काय असते?
संत परंपरेतील सर्वात वडीलधारे संत नामदेव !दीर्घायुषी ! वारकरी संप्रदायाची पताका खांद्यावर घेऊन देशभर प्रवास करणारे संत नामदेव पंजाबमध्ये ही गेले. त्यांच्या रचना “गुरूग्रंथ साहेब” आहेत. अशा संतांचे हे चरित्र!गुरू नानक, संत कबीर अशा श्रेष्ठ संताशी त्यांच्या भेटी आणि झालेला संवाद या चरित्रात आहे. हा फार महत्वाचा भाग आहे.
हे चरित्र वाचताना अनेक अभंग यात आलेले आहेत. ते अभंग स्वतः च त्या त्या घटना सांगणाऱ्या आहेत. त्यामुळे चरित्र आणि अभंग असा सुंदर ग्रंथ वाचकाला मिळतो.
शतकोटी कवने केली असे त्यांच्या बाबत म्हटले जाते. त्यांच्या अभंगांत समकालीन चरित्र आहेत. इतर संतांची माहिती आहे. त्या सगळ्या अभंगाचा अभ्यास करून लेखकाने नामदेव महाराज यांचे अतिशय रसाळ आणि सुरेख पण वास्तवदर्शी चरित्र तयार केलं आहे.
*****
संतचरित्रे लिहिण्यासाठी आवश्यक असलेली मनोभूमिका पांगारकरांच्या ठायी होती. उत्कट भक्तिभावामुळे ते संतांच्या जीवनाचे व कार्याचे मर्म सहृदयपणे समजून घेऊ शकले. चरित्राची साधने ते परिश्रमपूर्वक जमवत. संतांच्या जीवनातील आणि काव्यातील दोष दाखविणे त्यांना मान्य नव्हते. संतांनी केलेल्या चमत्काराच्या पारंपरिक कथांवर अविश्वास दाखविणे त्यांना योग्य वाटत नसे. श्री ज्ञानेश्वर, तुकाराम व एकनाथ महाराज या संतांची चरित्रे त्यांनी लिहिली. कोणाही सत्पुरुषाचे वर्णन ते नम्रभावाने करीत.
ल. रा. पांगारकर यांनी १२५ वर्षांपूर्वी लिहिलेले संत चरित्र ल. रा. पांगारकर उर्फ लक्ष्मण रामचंद्र पांगारकर हे संतचरित्रे लिहिण्यासाठीच जन्माला आले होते असे म्हणतात. हे विधान अतिशयोक्तीचे नाही याची प्रचीती त्यांनी लिहिलेले संत तुकारामांचे चरित्र वाचताना येते. तुकाराम महाराजांचे चरित्र लिहिताना त्यांनी अगदी रामेश्वर भटासदेखील झुकते माप दिले आहे. ल. रा. पांगारकर यांनी त्यांचा गौरव केलेला आहे. ‘आतां प्राकृत भाषेंत अधिकारसंपन्न शूद्रालाही धर्मरहस्य सांगायला हरकत नाहीं. कारण धर्मरहस्य भगवत्कृपेनें कोणत्याही जातीच्या शुद्धचित्त मनुष्यांत प्रगट होतें. ही गोष्ट सिद्ध करून देण्याला तुकोबाचा छळ होऊन ते त्यांत यशस्वी व्हावयास पाहिजे होते व या छळाचा कस होण्याचा मान रामेश्वरभटास मिळाला!’ अशा शब्दांत रामेश्वरभट्टांची भलामण केली आहे.
पांगारकरांच्या चिकित्सक वृत्तीचा परिचय करून घ्यायचा असेल तर त्यांचे मोरापंत चरित्र पाहावे, तुकाराम चरित्र पाहावे. प्राचीन वाङमयाचा विचार करताना पांगारकरांची दखल घेतल्याशिवाय पुढे जाता येण्यासारखे नाही. त्यांनी प्राचीन मराठी वाङमयाचे अत्यंत आवडीने आणि समरसतेने अध्ययन केले. मराठी भाषा आणि इतिहास यांचा व्यासंग करून, आपल्या लेखणीचा आणि वाणीचा प्रभावी वापर करून, जनमानसात या विषयांची गोडी निर्माण करण्याचे महान कार्य त्यांनी आमरण केले. त्यांना अनेक चाहते, मित्र लाभले. भगवंतांच्या स्मरणात त्यांनी नेहमीच गोडी मानली. आयुष्यभर ग्रंथरचनेचा हव्यास अडचणी सोसून रसिकतेने केला.
पुस्तक दुसरे
संत तुकाराम चरित्र
पृष्ठ : ३४६
ह्या ग्रंथाची इमारत कोणत्या आधारांवर उभारली आहे याचा उलगडा करणे अवश्य आहे. पहिला आणि मुख्य आधार म्हणजे तुकोबांचे अभंग हा होय. तुकोबांचे चरित्र त्यांच्या अभंगातच उत्कृष्ट लिहिले गेले आहे. त्यांचे अंतरंग, त्यांचा अभ्यास, त्यांचे अनुभव, त्यांचे उपदेश त्यांच्या अभंगात इतक्या स्पष्ट रीतीने प्रकट झाले आहेत की दुसऱ्या कोणालाही ते तसे वर्णन करून सांगता येणार नाहीत. अभंगंचे परिशीलन आणि मनन जितक्या आस्थेने, आवडीने व आदराने करावे तितके महाराज आपले हृदय उघडे करून दाखविण्यास तयार आहेत. परंपरेचे साह्य मात्र अवश्य धेतले पाहिजे.
ह. भ. प. पांगारकरांनी ‘आठ वर्ष’ मेहनत घेऊन लिहिलेले हे तुकारामचरित्र प्रथम 1920 साली तत्कालीन इंदूर संस्थानचे अधिपती सवाई तुकोजीराव होळकर यांनी दिलेल्या देणगीतूनच छापले होते. त्या काळी, संस्थानिकांच्या मदतीशिवाय अशी कामे होणे अशक्यच होते व आजही असे काम कठीणच आहे म्हणून गेल्या १०० वर्षात कोणत्याच प्रकाशकाने हे चरित्र छापण्याचे धाडस केले नाही यात नवल नाही. पण, वारकरी मंडळींच्या वाढत्या प्रतिसादामुळे दुसऱ्याच आवृत्तीपासून हे चरित्र कायमच उपलब्ध ठेवण्याचे ठरविले आहे आणि याप्रमाण आणखीही संतचरित्रे छापण्याचा वरदा प्रकाशन चा मनोदय आहे.
पुस्तक तिसरे –
श्री संत ज्ञानेश्वर महाराज चरित्र आणि ग्रंथ विवेचन –
पृष्ठ:२०४
ज्ञानेश्वर माऊलीचे हे रसाळ चरित्र वाचून मराठी माणसाचे हृदय हेलावून येईल. जाने ज्ञानेश्वरीचा अभ्यास केला आहे, त्याला तर या चरित्रातील अक्षरे अमृतालाही सजनी जिंकत आहेत असे वाटेल. सर्वसामान्य व्यक्तीला हे चरित्र पुन्हा पुन्हा वाचावेसे वाटेल. ज्ञानेश्वर हे मराठी संतांचे शिरोमणी! त्यांच्याविषयी अनेक संतांनी आपल्या अभंग त्यांची स्तुती केलेली आहे. हे अभंग ही लेखकाने ग्रंथाच्या शेवटी एकत्रित दिलेले आहेत.
पहिल्या प्रकरणांमध्ये आपल्याला संत ज्ञानेश्वर जन्मापूर्वीचा काळ म्हणजेच महाराष्ट्रातील पार्श्वभूमी समजते. यात महाराष्ट्राचा राजकीय, सांस्कृतिक, धार्मिक आणि शैक्षणिक इतिहास समजतो. मराठी माणसाला, राजा रामदेवराय यादव हे परिचित आहेत. पण यात यादव कुळाचा तपशील मिळतो. अनेक ग्रंथ रचनाकरांचा तपशील मिळतो. उदा भास्कराचार्य.
दुसरे प्रकरण कुलवृत्तान्त आहे. ज्ञानेश्वर महाराजांचे पूर्वज, यांचे माता पिता रुक्मिणी व विठ्ठलपंत यांचा विवाह, त्यांचा संन्यास रामानंदस्वामींचा अनुग्रह इत्यादीची माहिती मिळेल. याच प्रकरणांमध्ये संन्याशाच्या पोटची मुलं आणि त्यांचा छळ आलेला आहे.
असे एकेक प्रकरण सविस्तर आणि व्यापकपणे दिलेले आहे. प्रत्येक प्रकरणात गरजेनुसार अनेक अभंग रचना आहेत. त्या संदर्भ किंवा प्रमाण म्हणून वापरल्या आहेत.
पुस्तक : चौथे
संत एकनाथ चरित्र
पृष्ठ:२२२
गृहस्थाश्रमात राहून नाथांनी ब्रह्म स्थिती अभंग ठेवली! गृहस्थी जीवन अर्थात प्रपंच आणि अध्यात्मिक जीवन अर्थात परमार्थ या दोन्हीचा सुरेख मेळ घालण्याचे अत्यंत कठीण कार्य नाथांनी आपल्या जीवनात केलेले आहे.
शांतीब्रह्म या नावाने ओळखले जाणारे संत एकनाथ गृहस्थ जीवनातील आदर्श! शालीवाहन राजाची राजधानी पैठण नाथांमुळे आज महाराष्ट्राला माहिती आहे.
संस्कृत इतकीच प्राकृत ही महत्त्वाची आहे, असे सांगणारे संत एकनाथ माणसामाणसातील भेद मानत नसत. देश भ्रमण करताना काशी येथील ब्राह्मणांनी नाथांचा अतोनात छळ केला. पण नाथांच्या सद्वर्तन आला भुलून पुढे त्यांचा जय जयकार केला.
भागवत धर्माचा प्रसार नाथांनी केला. अभंग गवळणी भारुड यामाध्यमातून नाथांनी समाजामध्ये जागृती निर्माण केली. नाथांनी रचलेल्या आजही जगभर मागणी असते.
दासोपंत आणि नाथांचे भेट त्याच प्रमाणे नाथांनी ज्ञानेश्वर महाराजांचे दर्शन कसे घेतले याचेही या चरित्रामध्ये वर्णन वाचायला मिळते.
– – – –
ही माहिती आणि पुस्तकेही आपल्या परिचित वाचकांना, कीर्तनकार, प्रवचनकार, व्याख्याते, मराठी विषयाचे विद्यार्थी यांना आवर्जून पाठवू!
परिचय : श्री हर्षल सुरेश भानुशाली
पालघर
मो.9619800030
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
(संस्कारधानी जबलपुर के हमारी वरिष्ठतम पीढ़ी के साहित्यकार गुरुवर आचार्य भगवत दुबे जी को सादर चरण स्पर्श । वे आज भी हमारी उंगलियां थामकर अपने अनुभव की विरासत हमसे समय-समय पर साझा करते रहते हैं। इस पीढ़ी ने अपना सारा जीवन साहित्य सेवा में अर्पित कर दिया है।सीमित शब्दों में आपकी उपलब्धियों का उल्लेख अकल्पनीय है। आचार्य भगवत दुबे जी के व्यक्तित्व एवं कृतित्व की विस्तृत जानकारी के लिए कृपया इस लिंक पर क्लिक करें 👉 ☆ हिन्दी साहित्य – आलेख – ☆ आचार्य भगवत दुबे – व्यक्तित्व और कृतित्व ☆.आप निश्चित ही हमारे आदर्श हैं और प्रेरणा स्त्रोत हैं। हमारे विशेष अनुरोध पर आपने अपना साहित्य हमारे प्रबुद्ध पाठकों से साझा करना सहर्ष स्वीकार किया है। अब आप आचार्य जी की रचनाएँ प्रत्येक मंगलवार को आत्मसात कर सकें गे।
आज प्रस्तुत हैं बुन्देली कविता – “तनक रुको घमधैयाँ लै लो“।)