☆ “उचलला हारा..” – कवयित्री : बहिणाबाई चौधरी – रसग्रहण : अनंत गद्रे ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆
☆ उचलला हारा… बहिणाबाईंची कविता ☆
☆
उचलला हारा, हारखलं मन भारी ।
निजला हार्यात, तान्हा माझा शिरीहारी ।।
*
डोईवर हारा, वाट मयाची धरली ।
भंवयाचा मया, आंब्याखाले उतरली ।।
*
उतारला हारा, हालकलं माझं मन ।
निजला हार्यात, माझा तानका ‘सोपान’ ।।
*
लागली कामाले, उसामधी धरे बारे ।
उसाच्या पानाचे, हातीपायी लागे चरे ।।
*
ऐकूं ये आरायी, धांवा धांवा घात झाला ।
अरे, धांवा लव्हकरी, आंब्याखाले नाग आला ।।
*
तठे धांवत धांवत, आली उभी धांववर ।
काय घडे आवगत, कायजांत चरचर ।।
*
फना उभारत नाग, व्हता त्याच्यामधीं दंग ।
हारा उपडा पाडूनी, तान्हं खेये नागासंगं ।।
*
हात जोडते नागोबा माझं वांचव रे तान्हं ।
अरे, नको देऊं डंख, तुले शंकराची आन ।।
*
आतां वाजव वाजव, बालकिस्ना तुझा पोवा ।
सांग सांग नागोबाले, माझा आयकरे धांवा ।।
*
तेवढ्यांत नाल्याकडे, ढोरक्याचा पोवा वाजे ।
त्याच्या सूराच्या रोखानं, नाग गेला वजेवजे ।।
*
तव्हां आली आंब्याखाले, उचललं तानक्याले ।
फुकीसनी दोन्हीं कान, मुके कितीक घेतले ।।
*
देव माझा रे नागोबा, नही तान्ह्याले चावला ।
सोता व्हयीसनी तान्हा, माझ्या तान्ह्याशीं खेयला ।।
*
कधीं भेटशीन तव्हां, व्हतील रे भेटी गांठी ।
येत्या नागपंचमीले, आणीन दुधाची वाटी ।।
………
कवितेतल्या मोजक्या काही ओळीत किती सहजपणे एक थरारक प्रसंग उभा केला आहे बहिणाबाईंनी!
यातले काही शब्द भुरळ घालणारे आहेत.
प्रसंगाचे कथन असल्याने व कवितेत सांगायचा आहे म्हटल्यावर जिथून या प्रसंगास सुरवात झाली त्यानेच कवितेची देखील.
‘उचलला हारा’…
डोक्यावरच्या हाऱ्यात बाळ झोपलाय. म्हणून ‘शिरीहारी’. श्रीहरी नाही. किती गोड वाटते ते ऐकायला. अन कविता गातांना मिटर चुकला असते बहुतेक.
अन वाट मयाची धरल्ये. मयाची…म्हणजे मळ्याची.
आंब्याखाली हारा ठेवला. मनात कालवाकालव झाली. त्या बाळाला तसे तिथे एकट्याला सोडून उसाच्या फडात कामाला जातांना.
काम करतांना उसाची धारदार पाती हातापायास चरे पाडत होती.
आणि इतक्यात..
इतक्यात मोठ्या आवाजात ‘आरायी’ म्हणजे आरोळी ऐकू आली “धावा रे धावा! आंब्या खाली नाग निघालाय”
आंब्याखाली नागोबा?????
हे ऐकताच चर्र झाले. अरे देवा हे काय घडतंय. धावंतच पोहोचले आंब्याशी. पहाते तर काय? हारा पालथा पाडून बाळ व नागोबा दोघेही दंग आहेत खेळण्यात! तान्हं खेये नागासंग. अरे बापरे!
हात जोडले नागोबाला. शपथ घातली त्याला. तुला शंकराची शप्पथ आहे नागोबा. डंख नको मारू माझ्या सोपानाला.
आणि धावा केला त्या ‘बालकिसना’चा, बाळकृष्णाचा. अरे वाजव तुझा पावा, अन बोलाव त्या नागाला तुझ्याकडे. ऐक रे माझे, वाजव तुझा पावा.
आणि हे मी बोलत्ये तोच…
नाल्यापलिकडून ‘ढोरक्याचा’, म्हणजे गुराख्याच्या बासरीचे सुर ऐकू येवू लागले. आणि मग त्या सुरांच्या जादूने त्या रोखाने नाग निघून गेला.
तो निघून जाताच मी धावले आंब्याकडे. तान्ह्याला उचलून घेतले. कवटाळले. कानांत त्याच्या फुंकरले. आणि चटचट मुके घेतले त्याचे.
“नागोबा! मी आजूबाजूस नव्हते. तू त्याला डसला नाहीस. देवच रे बाबा तू. स्वतः तान्हा झालास व माझ्या या तान्ह्यास खेळवलेस.
नागोबा. होत राहील आपली भेट. आणि हो, येणाऱ्या नागपंचमीला तुझ्याकरता दुधाची वाटी मी येईन घेऊन!”
रसास्वाद : अनंत गद्रे
प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित
सांगली
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
आमच्या घराच्या शेजारच्या घरात आंबा आणि चिकू यांची मोठी झाडे आहेत. दोन्ही जवळ जवळ असल्याने एकमेकात मिसळून गेली आहेत. दोन्ही झाडे कायम हिरवीगार असतात. चिकू तर जास्तच, त्याची पानगळ कधी होते आणि नवीन पालवी कधी येते कळतच नाही. सहाजिकच असा वृक्षसंभार म्हणजे पक्षांचे आणि छोट्या सरपटणाऱ्या प्राण्यांचे निवासस्थान. आमच्या घराची खिडकी समोरच येते. त्यामुळे त्यांचे निरीक्षण करणे हा माझा छंद.
बरेच पक्षी झाडांना भेट देतात. कधी भारद्वाज आपल्या भारदस्त आवाजात साद घालतो. मला तो शाल पांगरलेल्या प्रौढ राजासारखा वाटतो. त्याच्या पाठीचा मखमली तांबूस रंग त्याला शोभून दिसतो. पांढऱ्या ठिपक्यांची साडी नेसलेली कोकिळा. आपल्या कर्कश आवाजात काळ्याभोर रंगाच्या, लाल डोळ्यांच्या, मंजुळ आवाजाच्या कोकिळाला साथ घालत असते. छोट्या सनबर्डची पळापळ अखंड सुरू असते. बारीकशी पिवळी चोच असणारी साळुंकी दबक्या पावलांनी वावरत असते. खारुताई खालीवर अखंड धावत असते. या झाडावरून त्या झाडावर उडी मारणे हा तिचा आवडता छंद. शेपटीच्या हलण्यावर आवाज करते, का आवाजाच्या तालावर शेपटी हरवते ते कळत नाही. मात्र दोन्ही क्रिया अखंड आणि एकदमच सुरू असतात, एवढे मात्र खरे. एक दोनदा दुर्मिळ शिक्रा व चष्मेवाला यांनीही दर्शन दिले. टिट, रॉबिन, पोपट, कावळा ही अधून मधून असतात. बुलबुलांचा बुलबुलाट अखंड सुरू असतो. तो विविध आवाजात ओरडतो. म्हणून मी त्याच्या ओरडण्याला बुलबुलाट म्हणते. एकदा आमच्या घराच्या खिडकीच्या ग्रीलवर त्याने घरटे केले. काड्या काड्याजमवून गोल वाटी तयार झाली. एक दिवस पाहिले तर जोडी ग्रील वर बसलेली. अंडी कधी घालतील याची आम्ही वाट पाहत होतो. पण कोणीच फिरकले नाही. घरटे खाली लोंबताना दिसले. बहुतेक महाराणींच्या पसंतीस महाल उतरला नाही. काय करणार. पण या पक्षाचे वैशिष्ट्य म्हणजे याच्या डोक्यावर टोपी असते. तपकिरी काळ्या रंगाचा, पांढरे पोट, रुंद चोच असलेला हा पक्षी गालावर दोन बाजूला लाल भडक रंगाचे डाग मिळवतो. शेपटीखालीही तसाच मोठा लाल टिपका असतो. समोरून पाहिला तर काळ्या शेंडीचा पांढर्या दाढीचा साधूच तो वाटतो. सगळे पक्षी मिळून काही वेळेला इतका कलकलाट करतात की पक्षांची शाळा भरली असावी.
या सर्वांपेक्षा माझे लक्ष वेधले ते नाचण किंवा नाचरा यानी(fantail). चिमणी सारखा छोटासा पक्षी, दहा-बारा सेंटीमीटर लांब, छोटीशी चपटी चोच आणि मातकट रंग. रंगाचे कोणतेही सौंदर्य नाही. पण एका जागेवर थांबली की शेपटीचा पिसारा फुलवते, तो पाहत राहावा. या पक्षाला स्थिरता नाही. अखंड पिसारा फुलवीत नाचत असतो. त्यामुळे नाव नाचण. मोराचे नृत्य भारदस्त व सौंदर्यवती नर्तकीच्या नृत्याची आठवण करून देते. तर नाचण तुरू तुरू चालणारी बारीक अशी छोटी बालिका. अखंड उत्साहाचा झराच. आता इथे दुसऱ्या क्षणी तेथे पसारा फुलवून तयार. या फुलवलेल्या पिसार्याची नागमोडी किनार त्याची शोभा वाढवते. मला उत्साह देणारी ही नाचण. अखंड घरात बसणारी मी. पण नाचण मला अखंड काहीतरी करायची उमेद देते. त्यामुळे मी काहीतरी लिहीत, वाचत राहते. म्हणूनच मला कार्य प्रवण करणाऱ्या या नाचणचे कौतुक.
‘संध्या.. आम्ही म्हणजे माझा मुलगा, सुन आणि मी सात वर्षांपूर्वी या जागेत राहायला आलो, माझा मुलगा आणि सुन नोकरीला जातात.. म्हणजे सकाळी नऊला बाहेर पडतात.. मग मी ग्यालरीत बसते.. आता तुमची ही बिल्डिंग झाली त्या ठिकाणी रिकामी जागा होती.. गुलमोहराची आणि आंब्याची झाडें होती..
‘मग ती झाडें तोडली की काय?
‘झाडें तोडूनच हा प्लॉट तयार केला.. मग मोजमाप सुरु झाले.. खड्डे पडले पाठोपाठ विटा, वाळू, लोखंड, सळी घेऊन ट्रक्स धावू लागले आणि कामगार पण पोचले. पुरुष आणि स्त्रिया… खड्ड्यात दगड, वाळू, सिमेंट घालू लागले. मग एका कामगारासाठी पाल उभे राहिले. बाकी कामगार जाऊन येऊन असायचे पण एक जोडी याच पालात राहू लागली.. कदाचित ते वाचमन असतील. त्यांची दोन मुले.. एक चार वर्षांची मुलगी आणि एक पाळण्यातील मुलगा. ती बाई त्या मुलाला झोळीत घालून काम करत असे. तिची मोठी मुलगी त्या आपल्या भावाला झोक देत असे, त्याच्या तोंडात पेजपाणी घालत असे. ती बाई दुपारी आली की त्या बाळाला पाजत असे.. मग संध्याकाळी आली की भाकऱ्या बडवत असे.. मग कालवण करून सगळी शांत झोपत.
‘मग तिचा नवरा? तो दारू पिऊन तिला मारत असे काय?
‘नाही.. तिचा नवरा कमालीचा देवभक्त होता.. तो संध्याकाळी भजने म्हणायचा.. मुलांना खेळवायचा..
‘म्हणजे काकू.. एकांदरीत ते गरीब, झोपड्यात रहाणारे पण समाधानी कुटुंब होते तर..?
‘होय.. खरेच.. मी देवळात जातानायेताना ती मुले दिसायची.. मी त्यांच्यासाथी खाऊ न्यायचे.. छोटया मुलाला बाहुल्या, खेळणी द्यायचे..
आणि एक दिवस ढग दाटून आले.. जोराचा वारा आणि पाऊस सुरु झाला, धुलीचे लोट जाऊ लागले, अनेक ठिकाणची झाडें पडली, त्यात त्या जोडप्याच्या पालावरील छप्पर उडून गेले.. संसार उघडा पडला..
‘अरे बापरे.. मग?
‘माझ्यासकट या बिल्डिंगमधील लोक धावली.. मी त्या सर्वाना माझ्या घरात घेऊन आले. चहापाणी दिले.
‘मग?
‘रात्रीपर्यत या बिल्डिंगचा बिल्डर आणि त्याची माणसे आली आणि त्यांनी त्या कुटुंबाची व्यवस्था त्यांच्या तोपर्यंत बांधून ठेवलेल्या जागेत केली.. म्हणजेच आज तुम्ही रहात आहात त्या जागेत केली..
‘काय? या आमच्या जागेत?
‘तेंव्हा ही तुमची जागा नव्हती आणि व्यवस्थित पण केलेली नव्हती, फक्त चार बाजूला विटा लावलेल्या होत्या.. खाली टाईल्स नव्हते, भिंतीना रंग नव्हता फक्त एक नळ जोडून दिला होता.
‘मग या जागेत ती मंडळी राहिली?
‘होय.. आता ती जोडी आणि त्यांची मुले मला अगदी जवळ आली.. त्या बाईचे नाव मुक्ता आणि त्याचे सदाशिव. मी ग्यालरीत बसले की त्यांचा संसार दिसायचा. मी मुक्ताला म्हंटले..
‘या मोठया पोरीला शाळेत घाल.. शिकेल ती..
‘साळेत घातलं तर बाबूला कोन बगणार… ती बघते म्हणूं मी कामावर जात्ये..
‘मग तू घरी आलीस की तिला माझ्याकडे पाठव.. मी घेईन तिचा अभ्यास..
‘ह्ये झाक हुईल..
असं म्हणून ती तिच्या मोठया मुलीला माझ्याकडे पाठवू लागली. मला पण जाग झाली.. मी तिला मुळाक्षरे, आकडे शिकवू लागले आणि ती पण शिकू लागली. पण त्याच दरम्याने मुक्ताचे पोट दिसायला लागले आणि त्या मुलीचे येणे अनियमित होऊ लागले आणि मुक्ताला मुलगी झाली.. मग मात्र आईचे करायला ती घरी राहू लागली. सातआठ दिवसांनी मुक्ता कामावर जायला लागली.. आणि आपल्या दोन्ही भावंडाना सांभाळायला ती मुलगी घरीच थांबली.
‘अरेरे.. मुलीचे शिक्षण थांबले म्हणायचे..
‘होय.. थांबले ते थांबलेच म्हणायचे.. पुढे ती शाळेत जाते की नाही की आईसारखी अशिक्षित राहते कोण जाणे?
‘मग कुठे आहेत आता मुक्ता आणि तिचा नवरा.. मुले?
तिसरे मूल सहा महिन्याचे होत आले तोपर्यंत या बिल्डिंगचे काम पुरे होत आले.. रंग लाऊन बिल्डिंग पुरी झाली.. तुमच्यासारखे लोक घर पहायला येऊ लागली.. आणि एक दिवस..
‘एक दिवस काय काकू?
‘एक दिवस मी नेहेमीप्रमाणे माझ्या ग्यालरीत बसले होते तर याच जागेतून मुक्ता आणि सदा ची बांधाबांध दिसून आली.. त्याचे सामान ते केव्हडे.. पण चार भांडी.. चिरंगुट.. लाकडे.. स्टोव्ह.. सगळे कापडात बांधलेली.. मला कळेना कुठ जातात ही? मी हाक मारुंन सदाला विचारलं..
‘सदाभाऊ.. कुठ बाहेर जाताय काय?
‘भायर कुठलं.. आता मालकांनी नवीन बांधायला घेतलं नव्ह.. तिथं जायचं..
माझा जीव कासावीस झाला.. गेली चार वर्षे या दोघांना आणि त्यान्च्या तीन मुलांना पहायची सवय.. तीनही मुले माझ्या डोळ्यसमोर मोठी झालेली..
‘मग आता परत येथे नाही येणार?
एव्हड्यात मुक्ता धाकट्या मुलीला कंबरेवर घेऊन आली. माझ्याकडे पाहून हलकेसे हसली.. थोरली एक पिशवी घेऊन चालायला लागली.. बाबूला सदाने खांदयावर घेतले आणि दोन हातात दोन पोती घेऊन चालायला लागला. मला वाटलेले निदान मुक्ताला तरी हे घर सोडताना जड वाटेल.. पण ती पण छोटीला कमरेवर आणि हातात लाकडाची मोळी, दुसऱ्या हातात एक पोत घेऊन नवऱ्याच्या मागोमाग चालायला लागली..
‘काय.. काकू.. रोज तुम्ही त्यांच्याशी बोलायचा.. त्याना जुने कपडे दयायचा..
मोठीचा अभ्यास घयायचा.. वाऱ्याने त्त्यांचे छप्पर उडाले तेंव्हा त्याना घरात घेतलेत तुम्ही.. तरीसुद्धा..
‘कशातही मन अडकवायचं नाही.. कसलेली पाश गुंडाळून घ्यायचे नाही यालाच जर अध्यात्म म्हणत असतील तर सदा आणि मुक्ताजोडीने मला ते शिकवले.. ज्या घरात म्हणजे संध्या आज तू ज्या घरात राहतेस, त्या घरात तीन वर्षे राहून त्या घराचा लोभ तिला झाला नाही.. मागे वळूनही न पहाता ती मुलांना घेऊन बाहेर पडली.
‘पण तुम्हाला कधी परत भेटतील का ती?
‘नाही भेटणार.. ती कदाचित मला आणि या बिल्डिंगला विसरून पण गेली असतील.. रोजचे काम हेच त्त्यांचे आयुष्य. मघा तू म्हणालीस संध्या.. दोन जागा सोडून तू या जागेत आलीस.. तुला ही तरी जागा लाभावी.. म्हणून. मी तुला खात्रीने सांगते.. ज्या जागेत सदा आणि मुक्ता.. त्यांची तीन मुले.. आनंदाने राहिली.. कसलीही अभिलाषा न ठेवता.. ती जागा तुला लाभणारच.. आजपर्यंत कधीही न मिळालेले सुख आणि समाधान या जागेत तुला मिळणारच..
पुऱ्या तळता तळता संध्या थांबली आणि तिने मला घट्ट मिठी मारली.
☆ “काल देव पुन्हा भेटला.. ” – लेखक : श्री सुबोध गाडगीळ ☆ प्रस्तुती – मंजुषा सुनीत मुळे ☆
मी म्हटलं, “हल्ली जरा जास्तच भेटतोयस. ”
“तुझं वय बघता networking वाढवून ठेवलेलं बरं, ” तो म्हणाला.
“काहीतरीच काय! ”
“मग तूच सांग. तुमच्याकडे पन्नाशीच्या पुढे डॉक्टर, CA आणि देव या तिघांशी संबंध चांगले ठेवायला सुरुवात होते की नाही? ”
मी हसलो.
देव आज चांगल्या mood मध्ये दिसत होता.
मी सहज विचारलं, “एक सांग. माझ्या आयुष्याचा हिशोब तुझ्याकडे असतो का? ”
“असतो. ”
“सगळा? ”
“सगळा. ”
“म्हणजे मी काय कमावलं, काय खर्च केलं, कुठे गेलो, काय केलं…? ”
“नाही रे. एवढा फालतू data ठेवायला माझ्याकडे server space नाही. ”
मी चमकलो.
“मग कसला हिशोब? ”
तो काही बोलला नाही.
मीच पुढे म्हणालो, “मला वाटलं असेल काहीतरी मोठं account. पुण्य किती, पाप किती… शेवटी net balance. ”
“तुम्ही माणसं ना, मला फार कमी लेखता. मला CA समजता की चित्रगुप्ताचा junior? ”
“मग काय नोंदवतोस? ”
“उदाहरण देतो. परवा तू एका माणसाला फोन केला होतास. ”
“कुठल्या? ”
“ज्याच्याकडून तुला काही काम नव्हतं. ”
मी आठवायचा प्रयत्न केला.
“अच्छा! सहज केला होता. ”
“माझ्याकडे तो सहज नव्हता. ”
“म्हणजे? ”
“त्याचा दिवस खराब गेला होता. तुझ्या दहा मिनिटांच्या फोनने जरा बरा झाला. ”
मी काही बोललो नाही.
“आणखी एक. काही दिवसांपूर्वी घरी सगळे बसले होते आणि तुम्ही कसल्यातरी फालतू विषयावर पोट धरून हसलात. ”
“त्याचीही entry? ”
“मोठी. ”
“आणि मी केलेली महत्त्वाची कामं? ”
“कुठली? ”
“इतकी वर्षं काम केलं, व्यवसाय उभा केला, पैसे कमावले, जबाबदाऱ्या पार पाडल्या… ”
देवाने माझ्याकडे विचित्र नजरेने पाहिलं.
“त्यासाठी तुला पैसे मिळाले ना? ”
“हो. ”
“मग त्याचं credit पुन्हा माझ्याकडे कशाला मागतोयस? ”
हा मुद्दा मला आवडला नाही.
“म्हणजे achievements ना काही किंमतच नाही? ”
“आहे ना. भरपूर आहे. पण गंमत अशी आहे की तुम्ही ज्या गोष्टींचा हिशोब आयुष्यभर ठेवता, त्यांचा मला फारसा ठेवावा लागत नाही. आणि ज्या गोष्टी तुम्ही कुठेच नोंदवत नाही, त्या मला जपून ठेवाव्या लागतात. ”
आता मी शांत झालो.
“उदाहरणार्थ? ”
“तुझ्यामुळे कोणाचा अपमान टळला. कोणाला गरज असताना तू थांबलास. कोणाचं पूर्ण ऐकून घेतलंस. स्वतः बरोबर असूनही एखादा वाद वाढवला नाहीस. कुणाच्या आनंदात मनापासून आनंदी झालास. एखाद्या माणसाला त्याच्या कठीण काळात ‘मी आहे’ एवढंच सांगितलंस. ”
मी म्हणालो, “पण यापैकी बरंचसं मला स्वतःलाही आठवत नसेल. ”
“म्हणून तर मी लिहून ठेवतो! ”
त्याच्या चेहऱ्यावर पुन्हा तेच खोडकर हसू आलं.
मला अचानक एक शंका आली.
“पण मग चुका? त्या पण लिहितोस? ”
“नक्की. ”
“किती आहेत? ”
“तुला उद्या काही काम नाही ना? ”
“एवढ्या? ”
“अरे, मी देव आहे. जादूगार नाही. ”
मी हसलो.
थोड्या वेळाने विचारलं,
“मग शेवटी माझ्या खात्यात काय उरेल? ”
तो म्हणाला,
“हीच तुमची अडचण आहे. प्रत्येक नातं, प्रत्येक काम, अगदी आयुष्यसुद्धा तुम्हाला शेवटी profit की loss एवढ्यात काढायचं असतं. ”
“मग हिशोब कशासाठी? ”
देव काही क्षण शांत राहिला.
“हिशोब तुला न्यायला नाही रे. तुला कधीतरी दाखवायला. ”
“काय? ”
“तू आयुष्यभर ज्या गोष्टींना मोठं समजत होतास, त्यातल्या बऱ्याच गोष्टी किती लहान होत्या आणि ज्या क्षणांना ‘यात काय विशेष? ’ म्हणून विसरून गेलास, तेच प्रत्यक्षात किती मोठे होते. ”
तो उठून निघाला. मी मागून विचारलं,
“मग आत्तापासून काय करू? ”
त्याने मागे न बघताच उत्तर दिलं,
…. “काही वेगळं करू नकोस. नाहीतर उद्यापासून प्रत्येकाला मदत करून मनात म्हणशील — ‘देवा, entry केलीस ना? ’”
मी जोरात हसलो.
तो थोडा पुढे गेला आणि थांबला.
“फक्त एक गोष्ट कर. ”
“काय? ”
“तुझ्या आयुष्यात ज्या गोष्टींची पावती मिळत नाही, त्यांना कमी किंमत देऊ नकोस. ”
आणि तो निघून गेला.
आपल्याला पगाराची slip मिळते. Investment चं statement मिळतं. धावण्याला वेळ मिळतो. कामाला appraisal मिळतं. घराला market value मिळते. Social media वर likes मिळतात.
म्हणून त्या गोष्टी खऱ्या वाटतात.
पण आईबरोबर निवांत बसलेली दहा मिनिटं, जुन्या मित्राचा विनाकारण आलेला फोन, मुलांबरोबर झालेलं फालतू हसणं, कोणीतरी अडचणीत असताना आपण न बोलता त्याच्या बाजूला उभं राहणं, यापैकी कशाचीही receipt मिळत नाही.
त्यामुळे बहुधा आपण त्यांचा हिशोबच ठेवत नाही आणि कदाचित आयुष्याची सगळ्यात मोठी गंमत हीच आहे, ज्याचा आपण काटेकोर हिशोब ठेवतो, ते शेवटी इथेच राहून जातं.
आणि ज्याचा कधी हिशोबच ठेवला नाही, तेच बहुधा आपल्याबरोबर येतं.
☆
लेखक : श्री सुबोध गाडगीळ
प्रस्तुती – मंजुषा सुनीत मुळे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
बऱ्याच ठिकाणी लग्नानंतर स्वागत समारंभाचे आयोजन केले जाते. हल्ली त्यासाठी ‘ रिसेप्शन ‘हा इंग्रजी शब्द मोठ्या प्रमाणावर प्रचलित आहे. कधी कोणाचा गौरव सोहळा असतो तर कधी कोणाची एकसष्ठी किंवा एकाहत्तरी किंवा सहस्रचंद्र दर्शनाचा कार्यक्रम अशा विविध कारणांनी असे कार्यक्रम आयोजित केले जातात. अशा कार्यक्रमांना आपण हजेरी लावतो. कार्यक्रम पत्रिकेत उपस्थित राहून आपण कार्यक्रमाची शोभा वाढवावी आणि स्नेहभोजनाचा लाभ घ्यावा असे आवाहन केलेले असते. हे स्नेहभोजन म्हणजे बऱ्याच वेळा बुफे असते.
‘ कार्यक्रमास उपस्थित राहून शोभा वाढवावी ‘ असे आवाहन केलेले असल्यामुळे सर्वजण उत्तम प्रकारचा पोशाख घालून अंगावर सुगंधी द्रव्य फवारून अशा कार्यक्रमांना जाऊन खरोखरीच त्यांची शोभा वाढवत असतात. बऱ्याच वेळेला असे कार्यक्रम म्हणजे फॅशन शो सारखे वाटतात. या कार्यक्रमांमध्ये काही ओळखीची बरीच मंडळी भेटते. एखाद्या लांबट टेबलवर पांढरे स्वच्छ आच्छादन घालून निरनिराळे खाद्यपदार्थ आकर्षक पद्धतीने मांडून ठेवलेले असतात. बाजूलाच नव्या कोऱ्या डिश असतात. जणू काही त्या कार्यक्रमासाठी नवीनच आणलेल्या! प्रत्येक डिशवर पेपर नॅपकीन असतो. मंडळी रांगेत उभे राहून आपल्या हाताने आपल्याला हवे ते पदार्थ घेत असतात.
वधू-वरांना किंवा सत्कारमूर्तींना स्टेजवर जाऊन भेटवस्तू द्यायची, शुभेच्छा द्यायच्या आणि यजमानांचा निरोप घेऊन मार्गस्थ व्हायचे असा साधारण हा प्रकार असतो. यजमान बिचारे मनापासून अशा कार्यक्रमांचे आयोजन करत असतात. त्यासाठी आपला वेळ, पैसा आणि श्रम खर्च करत असतात. आपण कार्यक्रमासाठी यावे आणि शुभेच्छा किंवा शुभाशीर्वाद द्यावेत असा त्यांचा प्रामाणिक हेतू असतो. आणि तो मोठ्या प्रमाणावर साध्य होतानाही दिसतो. परंतु अलीकडे अशा कार्यक्रमांमध्ये त्यांची सहजता जाऊन आणि मूळ उद्देश बाजूला पडून औपचारिकता आलेली दिसते.
खरंतर असे कार्यक्रम म्हणजे सामाजिक जीवनातील एक सुंदर प्रसंग! यानिमित्ताने समाजाच्या विविध स्तरातील लोक एकत्र येत असतात. प्रत्येक जण नेहमी आपापल्या कामात व्यस्त असल्यामुळे इच्छा असूनही मित्रांच्या, नातेवाईकांच्या किंवा ओळखीच्या लोकांच्या भेटी होत नाहीत किंवा त्यांच्याकडे जाण्यासाठी वेळ मिळत नाही. परंतु अशा प्रकारचे कार्यक्रम आपल्याला आपल्या ओळखीच्या व्यक्तींना भेटण्याची संधी उपलब्ध करून देत असतात. त्यामुळे अशा व्यक्तींकडे जाण्यासाठी जो वेळ आपल्याला द्यावा लागला असता तो वेळ वाचतो आणि त्यांच्याशी अनौपचारिक गप्पागोष्टी करण्याची संधी अनायासे उपलब्ध होते. परंतु किती जण या प्रसंगाचा असा लाभ घेतात?
अशा कार्यक्रमात आपल्या ओळखीची व्यक्ती दिसली की आपण आपला हात उंचावून त्यांना अभिवादन करतो किंवा हाय हॅलो म्हणतो. चेहऱ्यावर एखादी स्मितरेषा असते. फार तर ” काय? कसे आहात? खूप दिवसांनी भेटला ” या पलीकडे संभाषणाची गाडी पुढे जात नाही. असा औपचारिक संवाद होऊन जो तो आपापल्या उद्योगात (म्हणजे येथे जेवण्याच्या किंवा शुभेच्छा देण्याच्या कार्यक्रमात) मग्न होऊन जातो.
अशा प्रसंगी समाजाच्या विविध स्तरातील लोक एकत्र आलेले असतात. परंतु आपण सर्वांशी संवाद साधत नाही. आपल्या ओळखीचे, आपल्या बरोबरीचे, आपल्या सामाजिक स्तराला शोभतील अशा प्रकारच्या व्यक्तींशीच आपण फार तर थोडे हितगुज करतो. या कार्यक्रमात असेही काही लोक आलेले असतात की ज्यांचा सामाजिक स्तर किंवा प्रतिष्ठा आपल्यापेक्षा कमी असते. अशा लोकांना आपल्याशी बोलावेसे वाटते परंतु अशावेळी आपली प्रतिष्ठा किंवा अहंकार आडवा येतो आणि आपण त्यांच्याशी बोलणे टाळतो काही लोक तर अशाप्रसंगी ओळखही दाखवत नाहीत. आयोजकांनी आवाहन केल्याप्रमाणे आपण खरोखरच कार्यक्रमाची फक्त शोभा वाढवण्यासाठी येतो आणि एखाद्या शोभेच्या वस्तूसारखेच येतो आणि जातो.
पण खरं तर असे कार्यक्रम म्हणजे लोकांशी संबंध दृढ करण्याची मोठी संधी असते असे मला वाटते. आजच्या काळात जसे आपण अनेक गोष्टींचे रिन्यूअल करतो तसेच संबंधांचे देखील रिन्यूअल करण्याची ही संधी असते. आपल्या मित्रमंडळींची, नातेवाईकांची आस्थेने विचारपूस करावी, त्यांची सुखदुःखे जाणून घ्यावी यासाठी हे कार्यक्रम अनायासे संधी उपलब्ध करून देतात. पण औपचारिकता, कृत्रिमता, अभिमान, अहंकार, खोट्या प्रतिष्ठेच्या कल्पना यासारख्या गोष्टींमुळे आपण अशा प्रकारची चांगली संधी अशा कार्यक्रमांमधून दवडतो.
पण अशाही प्रसंगात प्रेमाने विचारपूस करणारे, आस्थेने चौकशी करणारे काही लोक भेटतात. असे लोक मला वाळवंटातील हिरवळीसारखे वाटतात. त्यांच्याजवळ कृत्रिमता नसते. अभिमान किंवा अहंकार नसतो किंवा खोट्या प्रतिष्ठेच्या कल्पनाही नसतात. अशी माणसे प्रेमाचे किंवा शीतलतेचे गुलाबपाणी प्रत्येकाच्या अंगावर शिंपत असतात. अशी माझ्या ओळखीची काही माणसे आहेत. ती भेटली म्हणजे जवळ येऊन आवर्जून बोलणारच! कधी कधी त्यांच्या पिशवीत गुलाबपुष्पे किंवा चाफ्याची फुले असतात. आपल्या ओळखीच्या व्यक्तींना ही फुले देऊन आपुलकीच्या सुगंधाची देवाण-घेवाण करतात. काहीजण जवळ येऊन अकृत्रिम हस्तांदोलन करतात किंवा गळाभेट घेतात. यातूनही संबंध दृढ होतात अशा व्यक्तींबद्दलची आपुलकी, प्रेम वाढीस लागते. अशी माणसे संकटप्रसंगी धावून येतात, मदतीला नेहमीच तयार असतात. अशी माणसे म्हणजे समाजरूपी उपवनात फुललेली सुंदर फुलेच! वाळवंटात सगळीकडे वाळूच वाळू पसरलेली असते आणि रखरखीत वातावरण असते. अशा वातावरणात कुठे अपवादाने हिरवळ दिसली की मन प्रसन्न होते. अशीच ही माणसे वाळवंटातील हिरवळ!
☆ वायू ऊर्जा (Air Element Energy) ☆ विभावरी कुलकर्णी ☆
वायू तत्व (Air Element) हे पंचमहाभूतांपैकी (पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश) अत्यंत महत्त्वाचे आणि गतिमान तत्व आहे. आपल्या शरीरात आणि विश्वात हालचाल, प्राणशक्ती आणि संवाद साधण्याचे काम वायू तत्व करते.
या वायू तत्वाचे आपल्या जीवनातील उपयोग आणि फायदे खालीलप्रमाणे आहेत.
१. वायू तत्वाचे शरीरातील आणि दैनंदिन जीवनातील उपयोग
प्राणवायूचा पुरवठा (Respiration): वायू तत्वाचा सर्वात मुख्य उपयोग म्हणजे श्वसन. शरीरातील प्रत्येक पेशीला ऑक्सिजन पुरवणे आणि कार्बन डायऑक्साइड बाहेर टाकणे हे वायू तत्वामुळेच शक्य होते.
शारीरिक हालचाली शरीरातील रक्ताभिसरण अन्ननलिकांमधून अन्नाची हालचाल, हातापायांची हालचाल आणि मज्जासंस्थेद्वारे होणारे संदेशवहन हे सर्व वायू तत्वाच्या नियंत्रणाखाली असते.
उत्सर्जन क्रिया शरीरातील टाकाऊ पदार्थ (मल-मूत्र, घाम) बाहेर टाकण्याच्या प्रक्रियेत वायू तत्व (विशेषतः अपान वायू) महत्त्वाची भूमिका बजावते.
संवाद आणि आवाज आपण जे बोलतो, तो आवाज हवेच्या माध्यमाशिवाय दुसऱ्यांपर्यंत पोहोचू शकत नाही. त्यामुळे संवाद साधण्यासाठी वायू तत्व आवश्यक आहे.
२. वायू तत्वाचे आरोग्यदायी फायदे
जेव्हा शरीरात वायू तत्व संतुलित असते, तेव्हा त्याचे अनेक शारीरिक आणि मानसिक फायदे मिळतात:
मानसिक आणि बौद्धिक फायदे
विचारांची स्पष्टता आणि एकाग्रता – संतुलित वायू तत्व बुद्धीला तीक्ष्ण करते. यामुळे नवीन गोष्टी शिकण्याची क्षमता, कल्पकता (Creativity) आणि विचारांमध्ये स्पष्टता येते.
उत्साह आणि चैतन्य शरीरात वायूचा प्रवाह योग्य असेल तर आळस दूर होऊन दिवसभर ताजेतवाने आणि उत्साही वाटते.
शारीरिक फायदे
उत्तम पचनक्रिया – आयुर्वेदामधील ‘समान वायू’ जठराग्नीला प्रदीप्त करतो, ज्यामुळे अन्नाचे पचन नीट होते.
त्वचेचे आरोग्य:-
वायू तत्व शरीरातील स्पर्शज्ञानाशी संबंधित आहे. वायू संतुलित असेल तर त्वचेवरील चमक कायम राहते आणि त्वचा निरोगी राहते.
लवचिकता:- स्नायू आणि सांध्यांमध्ये योग्य प्रमाणात वायू असल्यामुळे शरीरात लवचिकता (Flexibility) टिकून राहते.
वायू तत्व संतुलित करण्याचे उपाय
शरीरात वायू तत्व बिघडल्यास (उदा. वात दोष वाढल्यास) सांधेदुखी, गॅसेस, त्वचा कोरडी पडणे किंवा अस्वस्थता (Anxiety) यांसारखे त्रास होऊ शकतात. ते संतुलित ठेवण्यासाठी खालील उपाय फायदेशीर ठरतात:
प्राणायाम अनुलोम-विलोम, कपालभाती आणि भ्रामरी प्राणायामामुळे शरीरातील वायू तत्वाचे शुद्धीकरण आणि संतुलन होते.
वायू मुद्रा: अंगठ्याचे टोक तर्जनीच्या (पहिले बोट) मुळाशी लावून उर्वरित तीन बोटे सरळ ठेवल्यास ‘वायू मुद्रा’ बनते. ही मुद्रा रोज १५ ते २० मिनिटे केल्याने सांधेदुखी आणि पोटातील गॅस कमी होतो.
निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवणे: पहाटेच्या शुद्ध हवेत फिरणे किंवा बागेत बसून दीर्घ श्वास घेतल्याने शरीराला शुद्ध वायू तत्वाचा लाभ होतो.
आहार: वात वाढवणारे पदार्थ (जसे की अतिशय कोरडे, शिळे किंवा थंड अन्न) टाळावेत. आहारात तूप, कोमट पाणी आणि ताज्या अन्नाचा समावेश करावा.
वायू तत्व हे आपल्या शरीरातील ‘प्राणशक्ती’ (Life Force) आहे. मनाची शांती, शरीराची गती आणि उत्तम आरोग्यासाठी वायू तत्वाचे संतुलन राखणे अत्यंत आवश्यक आहे.
वायू तत्त्वाची (Air Element) ऊर्जा आपल्या शरीरात प्राणायाम, सजगता आणि ध्यानधारणा याद्वारे मिळवता येते. निसर्गात वायू हा गतिमानता, मोकळेपणा, विचार आणि संवादाचे प्रतीक आहे. शरीरात याचे स्थान प्रामुख्याने अनाहत चक्र (हृदय चक्र) आणि श्वसनसंस्थेशी जोडलेले असते.
वायू तत्त्वाची ऊर्जा सक्रिय करण्यासाठी आणि ती आत्मसात करण्यासाठी खालीलप्रमाणे ध्यान (Meditation) आणि काही पद्धतींचा अवलंब करता येईल.
१ स्पर्श अनुभवणे: तुमच्या त्वचेला स्पर्श करून जाणाऱ्या हवेच्या मंद लहरींचा (हळुवार वाऱ्याचा) जाणीवपूर्वक अनुभव घ्या.
२. प्राणायाम (श्वसनाचे नियंत्रण)
वायू तत्त्वाचा थेट संबंध आपल्या श्वासाशी आहे. त्यामुळे प्राणायामाद्वारे ही ऊर्जा सर्वात जलद मिळते:
३. ज्ञान मुद्रा (Gyan Mudra)
वायू तत्त्व संतुलित करण्यासाठी ‘ज्ञान मुद्रा’ किंवा ‘वायू मुद्रा’ अत्यंत प्रभावी आहे.
ध्यानाला बसताना अंगठ्याचे टोक आणि तर्जनीचे (पहिले बोट) टोक एकमेकांना स्पर्श करतील अशा स्थितीत हात गुडघ्यावर ठेवा.
यामुळे मनाची एकाग्रता वाढते आणि विचारांमधील अस्थिरता कमी होऊन वायू तत्त्वाची ऊर्जा योग्य दिशेने प्रवाहित होते.
४. अनाहत चक्रावर ध्यान (Heart Chakra)
वायू तत्त्वाचे मुख्य केंद्र हृदय मानले जाते.
ध्यानादरम्यान आपले संपूर्ण लक्ष छातीच्या मध्यभागावर (अनाहत चक्र) केंद्रित करा.
या चक्राचा रंग हिरवा आहे. तिथे हिरव्या रंगाच्या प्रकाशाची कल्पना केल्यास किंवा ‘यं’ (YAM) या बीजाक्षराचा मानसिक जप केल्यास वायू तत्त्वाची ऊर्जा जागृत होते.
५. निसर्गाशी जवळीक
प्रातःकालीन भ्रमण: पहाटेच्या वेळी किंवा संध्याकाळी मोकळ्या हवेत, बागेत किंवा टेकडीवर फिरायला जाणे.
विस्तीर्ण आकाशाकडे पाहणे: मोकळ्या आकाशाकडे काही वेळ शांतपणे पाहिल्याने मनातील संकुचितपणा दूर होतो आणि वायू तत्त्वासारखा मोकळेपणा अनुभवास येतो.
☆ मला फक्त मज्जा करायचीये– लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – अंजली दिलीप गोखले ☆
“मला फक्त मज्जा करायचीये”… विषय संपला.
“मज्जा केलीच पाहीजे” ही बळजबरी माणसं एकमेकांच्या उरावर पांघरू लागलीयेत.
इथे “मज्जा” ही निवडीची गोष्ट राहीली नाहीये; ती “निकड” झालीये; केली गेलीये. मज्जा कशी करायची हे निवडण्याचंही स्वातंत्र्य नाही; ती समाजातल्या “मॉडर्न” शहाण्यांनी (!) आखून दिलेल्या पद्धतीनेच व्हायला हवी.
तशी ती नाही केली म्हणजे फालतू आहात तुम्ही, हे तुमच्या तोंडावर फेकून मारलं जातंय. म्हणजे पहा –
“बर्थडे सेलिब्रेशन घरात? शी… “
“पार्टी नाही? शी… “
“फ्रायडे नाईट, आणि तू घरी आहेस? शी… पथेटिक… “
तुम्ही घरी स्वयंपाक वगैरे करून खाता विकेंडला! ? फारच बोरिंग….
“तू आजवर कधी पब मध्ये गेलीच नाहीस? काय काकूबाई आहेस गं… “
यात नफ्याची आर्थिक गणितं ठासून भरलेली आहेत. नव्वदच्या दशकात ग्लोबलायजेशन आपल्यावर येऊन आदळलं; आणि त्या नवश्रीमंतीच्या लाटेवर अनेकजणांनी विचार-विवेक गहाण टाकले.
तसे त्यांनी ते टाकावेत, जास्तीत जास्त मासे या भोगवादात सापडावेत, यासाठी (त्यातल्या त्यात।पाश्चात्य) कॉर्पोरेट कंपन्यांनी मार्केटिंगची जाळी मस्तपैकी सर्वदूर फेकली होतीच.
TV, सिनेमा, सततच्या जाहिरातींच्या भडिमाराने आमचा सुरेख ब्रेन वॉश केला.
न्युरोलिंग्विस्टिक प्रोग्रामिंग तंत्राच्या वापराने, ध्वनी व दृश्य या दोघांनी आमचे कान आणि डोळे स्वप्नांत गुंतवले. मध्यमवर्गीय काटकसरीने म्हातारपणाच्या चिंता सोडून “आजचं बघा” हा अमेरिकन मंत्र स्वीकारला. मग अचानक वाढदिवसाला निरांजनांच्या ओवाळणी backward झाल्या; वीस-पंचवीस हजारांचं हॉटेलवालं सेलिब्रेशन रितीचं झालं.
“अनलिमिटेड बुफे” च्या नावाखाली बार्बेक्यूंच्या भट्टीत पगार जाळून घेणं हे “त्यात काय एवढं? ” असं झालं.
जीन्स पाचशेच्या पाच हजार झाल्या. पुर्वी कुत्रा कोण ज्या कॉटनला विचारत नव्हतं, तेच कॉटन “लिनन”च्या रुपात थेट स्टेटस सिम्बॉल बनलं.
एक दिवसाचं मराठी लग्न पाच दिवसांचं “big fat पंजाबी वेडिंग” झालं; घराच्या हॉलमधले साखरपुडे नि टिळे हे फाईव स्टारवाले “इवेन्ट्स” झाले.
मज्जा, आनंद, आपल्या आत निर्माण करायचा असतो म्हणताय? तुमची संस्कृती तसं सांगते? हड. चुलीत घाला तुमची संस्कृती. आमचं Grand Live life kingsize उधळणं घ्या. बायकोला सोन्या-चांदीतून बाहेर काढा; हिरे नि प्लेटिनम मध्ये तिला बुडवून काढा.
तुमच्या पोराला गर्लफ्रेन्ड नि पोरीला बॉयफ्रेन्ड असलाच पाहीजे. त्यांच्या “प्रेमाचं” मूल्यमापन गिफ्टच्या किमतीवर ठरेल.
कमवा; आणि उडवा.
तुम्ही तुमच्या नवाबज़ाद्यांकडे पाहा बघू. लिव Macho!!
भले तुम्ही स्टायपेन्डवाले ट्रेनी इंजिनिअर असा.
विषय इतपत येऊन थांबलेला नाही. दारू नि सिगरेटचं उदात्तीकरण तर आता जुनं झालं. आता त्याच्यापुढे सर्वसामान्य मराठी मध्यमवर्गीय पोरांच्या तोंडीही “वीड”, “ग्रास” हे शब्द येऊ लागलेत.
यांचे अर्थ माहितीयेत? गांजासारख्या भयानक नशील्या पदार्थांची अमेरिकेतून उचललेली बोली भाषेतली नावं आहेत ही.
या घाणीची जाहिरात थेट करता येत नाही; पण त्यासाठी आमचे नव्याने पैदास झालेले “रॉकस्टार्स” आणि “rap singers” आहेत ना! त्यांच्या गाण्यांतून या अमली विकृतीची भलावण रोजच्या रोज होतेय. “मनाली ट्रान्स” म्हणे. शोधा गुगलवर लिरिक्स. शब्दांना जोड दृश्यांची. दृश्यांत ठासून भरलेला सेक्स. अनिर्बंध, अमर्याद आणि मुद्दाम चाळवणऱ्या अनैतिक नात्यांचा, अगदी घरच्या अंतर्गत नात्यातही तो मुक्तहस्ते सपोर्ट करणारा!!! एकेक वेब सिरिज मनोरंजन कमी, आणि पोर्नोग्राफी जास्त इतपत मज्जेच्या डेफिनेशन्स गेलेल्या!!! तरुणांना नाद लावायला तेवढं पुरतं.
चील… एंजॉय… पार्टी चलेगी टिल सिक्स इन द मॉर्निंग.
मग मेलात तरी चालेल.
आपण ठरवलेलं उद्दिष्ट हे प्रत्यक्षात आपण स्वत: निवडलेलं नसून, ते आपल्याला गंडवून आपल्याकडून निवडून घेतलं गेलंय, हे लक्षात येतंय आपल्या?
चंगळवाद हा एक कॉर्पोरेटधार्जिणा पंथ झालाय. पंथामध्ये विचार आणि आचार निवडीचं स्वातंत्र्य नसतं. कुणीतरी महाभागाने सांगितलेलं तत्वज्ञान तो महापुरूष आहे असं सगळे म्हणतात म्हणून, मुकाट्याने नाकासमोर धरून चालणं, हे पंथाचं आचारशास्त्र असतं. तेच चंगळवादाचं आहे. “आम्ही कित्ती आनंदात आहोत”, “आमचं कित्ती मस्त चालू आहे”, “आम्ही कित्ती एंजॉय करतोय”, *हे दुसऱ्याला दाखवणं*, हा चंगळवादाचा अट्टहास असतो.
ते दुसऱ्याने सत्य म्हणून मान्य केलं, तर चंगळवादाचा विजय असतो. आणि आपण ओढवून घेतलेल्या पद्धतीचा दुसऱ्याने स्वीकार केला, तर तो चंगळवादाचा दिग्विजय असतो.
मुद्दा हा आहे, की या झुंडीत सामील झाल्यावर आपण किती “cool” आहोत, याच्या देखाव्यांचं एक compulsion असतं ना; त्यात बऱ्याच जणांचा श्वास कोंडला जातो.
तो देखावा न करणाऱ्यांना पाखंडी समजून झुंडीबाहेर फेकलं जातं.
मुळात जे झुंडीत कधी सामील झालेच नाहीत, किंवा आर्थिक कारणांमुळे होऊ शकले नाहीत, त्यांच्याकडे आगाऊपणाने “सो पथेटिक” म्हणून नकारात्मकतेने पाहीलं जातं; त्यांच्या मनात स्वत:बद्दल न्यूनगंड निर्माण होईल याचे पद्धतशीर प्रयत्न सुरू होतात.
गंमत म्हणजे, चंगळवादाचे पुरस्कारकर्ते व्यक्तिस्वातंत्र्याच्या गप्पा मारतात; पण हीच सोंगं आयुष्य आनंदाने जगण्याचे प्रत्येकाचे स्वतंत्र वेगळे मार्ग असू शकतात, हे साधं सत्य दुसऱ्याला नाकारतात.
त्यावेळी आपण त्याच्या व्यक्तिस्वातंत्र्याचा संकोच करतोय, हे यांच्या गावीही नसतं. म्हणूनच मग “तुम्ही दारू पिऊन पार्ट्या करत नाही, म्हणजे आयुष्य कसं एंजॉय करायचं ते तुम्हाला माहीतच नाही”, अशी बिनडोक तर्कटं मांडली जातात; जी हास्यास्पद ठरतात.
हेअर जेल, मेक अप आणि ब्रांडेड कपड्यातली बिनधास्त आहोत हे दाखवत राहण्याची केविलवाणी धडपड नजरेत लपत नसते. ब्रांडेड आयुष्यातल्या पोकळ्या वेडावतातच.
जागे होऊया रे.
स्वत्व नको विकूया आपण.
दुनियेतल्या प्रत्येकाला आपण आवडलोच पाहीजे, हा मूर्ख विचार सोडूया; आणि करूया हिंमत स्वत:चा स्वतंत्र जीवनभाव निवडण्याची. सेलिब्रेशन्स मिळकतीची होऊ देत; आणि ती नजाकतीची होऊ देत!!
उधळण्याच्या फुलबाज्या क्षणभरच चमकतात; स्वतंत्र विवेकाचा सूर्य अनंतकाळ चमकतो.
आपण सूर्य निवडू या.
लेखक : अज्ञात
प्रस्तुती : अंजली दिलीप गोखले
मोबाईल नंबर 8482939011
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
कोकणात पूर्वी गरिबी होती. आज हे वाक्य आपण सहज बोलून जातो. पण त्या गरिबीचा अर्थ फक्त घरात पैसे कमी होते एवढाच नव्हता. बाजारातून आज काय आणायचं, हा प्रश्न विचारण्याआधी, आज परसात काय आहे? हा प्रश्न विचारावा लागायचा. आणि कदाचित कोकणातल्या अनेक अप्रतिम पदार्थांचा जन्म याच प्रश्नातून झाला असावा.
परसात फणसाचं झाड होतं. फणस पिकेपर्यंत थांबायची गरज नव्हती. कच्चा फणस आला की भाजी. तो पिकला की गरे. गरे जास्त झाले की सांदणं. त्याची साठं. आणि सगळं संपल्यावर राहिलेल्या आठळ्याही कचऱ्यात नाहीत. त्या भाजून खायच्या. नाहीतर त्यांची भाजी.
आंब्याची गोष्ट तर आणखी मोठी. आंबा पिकण्याआधी कैरी. कैरीचं लोणचं. पन्हं. चटण्या. मग आंबा पिकला की रस. रस खाऊन झाला तरी गोष्ट संपत नाही. त्याची साठं. आंब्याचा शिरा.
आणि शेवटी राहिलेली बाठसुद्धा भाजून खायची.
पण या सगळ्यांचा खरा राजा—नारळ. कोकणाचा कल्पवृक्ष.
शहाळं असताना गोड पाणी आणि मऊ मलई. नारळ झाला की ओलं खोबरं. त्याचं दूध काढायचं. चटणीत घालायचं. भाजी-आमटीच्या वाटणात वापरायचं. मोदक, नारळीभात, करंज्या अशा कितीतरी पदार्थांत खोबरं. खोबरं सुकलं की सुकं खोबरं. त्यापासून तेल. पण नारळाचं मोठेपण स्वयंपाकघराच्या दाराशी संपत नव्हतं. करवंटीही कामाची.
आणि झावळी?
ती वाळली की तिच्या हिरांपासून झाडू. झावळ्यांचा उपयोग घर शाकारायला.
म्हणजे ज्या झाडाने ताटात चव दिली, त्याच झाडाने अंगण झाडायला झाडू दिला आणि डोक्यावर छप्परही दिलं!
त्याला कल्पवृक्ष म्हणणं ही केवळ काव्यात्मक उपमा नव्हती.
ती कोकणी माणसाने त्या झाडात शोधलेली पूर्ण उपयोगाची शक्यता होती.
परसात अळू उगवलं तर त्याचं फदफदं. तीच पानं बेसन-मसाला लावून गुंडाळली की अळूवड्या.
कोकम आलं—सरबत झालं. साल वाळवली की आमसूल.
चिंच आली— गर खाल्ला. आणि चिंचोकासुद्धा मुलांच्या जगात निरुपयोगी नव्हता.
म्हणजे त्या घरात कचरा कुठे संपतो आणि कच्चा माल कुठे सुरू होतो, याची सीमाच फार अस्पष्ट होती.
आज supermarket मध्ये गेल्यावर आपल्यासमोर शेकडो पर्याय असतात.
त्या काळात पर्याय कमी होते. पण कल्पकता जास्त होती.
आज आपला प्रश्न असतो— “आज काय खायचं? ”
तेव्हा प्रश्न बहुधा वेगळा असावा— “आज जे मिळालंय, त्यातून काय काय करता येईल? ”
दोन प्रश्न.
पण दोन अगदी वेगळ्या जीवनदृष्टी.
पहिल्या प्रश्नाला पैसा पर्याय देतो. दुसऱ्या प्रश्नाला कल्पकता.
कदाचित म्हणूनच कोकणी स्वयंपाकाची खरी श्रीमंती पदार्थांच्या संख्येत नव्हती. ती एका गोष्टीतून किती गोष्टी निर्माण करता येतात, यात होती.
फणस फक्त फळ नव्हता. आंबा फक्त आंबा नव्हता. कोकम फक्त सरबत नव्हतं. आणि नारळ तर कधीच फक्त नारळ नव्हता.
परसात जे उगवलं, त्याच्याशी त्या पिढीने जणू एक करारच केला होता— “तू जे देशील, त्यातून आम्ही काहीतरी चांगलं करू. ”
मला या वाक्यात फक्त पाककला दिसत नाही. एक संपूर्ण पिढी दिसते. कारण त्यांच्या आयुष्यातही त्यांना हवं ते सगळं मिळालं नाही.
हवा तितका पैसा नाही. हवी ती साधनं नाहीत. हव्या त्या संधी नाहीत. पण त्यांनी आयुष्याकडेही कदाचित आपल्या परसासारखंच पाहिलं.
जे उगवलं, त्याचा उपयोग केला. अभावाचं लोणचं घातलं. अडचणीचं सांदणं केलं. कष्टाचं सरबत केलं. आणि पुढच्या पिढीच्या ताटात शक्य तितकं चांगलं वाढलं.
आज आपल्या घरात पर्याय जास्त आहेत. फ्रिज भरलेले आहेत. बाजार एका फोनवर घरी येतो.
पण म्हणूनच कदाचित तो जुना प्रश्न अधिक महत्त्वाचा झाला आहे – समृद्धी म्हणजे आपल्या हातात किती गोष्टी आहेत हे,
की हातातल्या एका गोष्टीत किती शक्यता आपल्याला दिसतात हे?
कोकणातल्या त्या जुन्या परसांनी त्याचं उत्तर फार पूर्वी दिलं होतं.
त्यांच्याकडे फार काही नव्हतं. पण जे होतं, त्यातलं फारसं काही “फक्त एवढंच” नव्हतं. फणसात त्यांना अनेक पदार्थ दिसत होते. कैरीत पुढचा ऋतू दिसत होता. कोकमात वर्षभराची चव दिसत होती. नारळात तर अन्नापासून छपरापर्यंत एक संसार दिसत होता.
कदाचित म्हणूनच गरिबीने कोकणाला फक्त काटकसर शिकवली नाही. तिने एक वेगळीच श्रीमंती शिकवली.
निसर्गाने किती दिलं, यावर समृद्धी ठरत नाही. त्याने जे दिलं, त्यात आपल्याला किती शक्यता दिसल्या, यावर ती ठरते.
☆
लेखक :अज्ञात
प्रस्तुती : रेखा जांबवडेकर
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈