माझ्या मराठीची गोडी, मला वाटते अवीट मराठी माझी मातृभाषा आहे आणि तिचं संवर्धन, विकास, विस्तार ही माझीदेखील जबाबदारी आहे. माझ्या क्षमतेनुसार मी त्यासाठी नक्कीच कायम प्रयत्नशील राहीन.
सुमारे आठशे वर्षांपूर्वी, ज्ञानेश्वर माऊलींनी आपल्या मराठी भाषेबद्दलचा अभिमान, प्रेम आणि मराठी शब्दांच्या सामर्थ्यावरील विश्वास, व्यक्त केला आहे. खरंच अवीट गोडी असलेली अशी ही आपली मराठी भाषा! या भाषेचं वैभव वाढवलं ते संत ज्ञानेश्वर, तुकाराम, रामदास, जनाबाई इ. महान संतांच्या वाङ्मयानी. या त्यांच्या साहित्याने रसिकमनांचं केवळ मनोरंजन न करता, अखिल विश्वाच्या कल्याणाचा विशाल दृष्टिकोन त्यांना दिला. तेही कोणताच भेदभाव न करता! हे आमच्या मराठी भाषेचं सामर्थ्य आणि परंपराआहे. आणि ती साहित्य परंपरा आजतागायत चालू ठेवली ती, श्री.महादेवशास्त्री जोशी, ना. सी. फडके, वि. वा.शिरवाडकर, बालकवी , इंदिरा संत, शांताबाई शेळके, पु. ल. देशपांडे अशा आमच्या शेकडो प्रतिभावंत लेखक, कवी आणि नाटककारांनी!
पण आज आमच्या भाषेचं वैभव जणू लुप्त झालं आहे. इंग्रजी भाषेचा पगडा आमच्या समाजमनावर इतका जबरदस्त आहे की त्यापुढे आपली मातृभाषा मराठी किती समृद्ध आहे, याचा विसर पडू लागला आहे. अटीतटीच्या या स्पर्धेच्या युगात यशस्वी होण्यासाठी, इंग्रजी भाषेत शिक्षण घेणं हाच एकमेव उपाय आहे, अशी बहुजन मराठी समाजाची समजूत झाली आहे. किंबहुना आपला पाल्य कोणत्या इंग्रजी शाळेत शिकतो, हा त्यांच्या प्रतिष्ठेचा विषय झाला आहे.
महाराष्ट्र टाइम्स, लोकसत्ता, सकाळ, अशी मराठी वृत्तपत्रे आवर्जून मराठी बाणा जपताना दिसतात. तेवढाच आशेचा किरण!अन्यथा आज महाराष्ट्रात मराठीची उपेक्षा होताना दिसत आहे.पण भारतातील इतर राज्यांत आणि परदेशात वास्तव्य करून असलेली मंडळी मात्र विविध उपक्रमांद्वारे, मराठी भाषा आणि संस्कृती जपण्याचा प्रयत्न करताना दिसतात.
मराठी या आपल्या मातृभाषेचा विसर पडणे याचा दूरगामी परिणाम म्हणजे मराठी संस्कृतीही नामशेष होणे! हा विघातक परिणाम टाळायचा असेल तर मराठी भाषेच्या संवर्धन आणि वृद्धीसाठी, जाणीवपूर्वक आणि परिणामकारक प्रयत्न करणे आवश्यक आहे. सातत्याने पाठपुरावा केला पाहिजे. या हेतूनेच १४ ते २८ जानेवारीपर्यंत, मराठी भाषा संवर्धन पंधरवडा, महाराष्ट्र शासनातर्फे, २७ फेब्रुवारी, हा जागतिक मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो. इथल्या सर्व शाळांमध्येही मराठी हा सक्तीचा विषय केला आहे. सार्वजनिक ठिकाणी असलेले नामफलक आणि सूचनाफलक हे ठळक मराठी भाषेतच असावे, यासाठी नियम लागू केले आहेत.
महाराष्ट्र राज्याची राजभाषा मराठी असल्याने, महाराष्ट्रातील सर्व व्यवहार हे मराठी भाषेतूनच झाले पाहिजेत. तसा आपलाच आग्रह असला पाहिजे पण आम्ही भलतेच सहिष्णू! घरातून बाहेर पडल्यावर रिक्षावाल्याला ‘ ऑटो ‘ म्हणून पुकारतो आणि ‘ स्टेशन जाना है’ असं सांगतो. आमच्या भाषेला आम्हीच मान देत नाही तर इतरांची काय कथा? आपण प्रत्येकाने जास्तीत जास्त मराठीत बोलण्याची, समाजमाध्यमांवर लिहिण्याची सवय केली, तर इथे आलेल्या अन्य भाषिकांना ती भाषा शिकावीच लागेल. कारण त्याशिवाय त्यांना इथे व्यवहार करणं, स्थापित होणं, अशक्य होईल.
भ्रमणध्वनी आणि आंतरजालाच्या वाढत्या वापरामुळे वाचनसंस्कृती लयाला चालली आहे. त्यासाठी बालकांना, तरूणवर्गाला आकर्षित करेल, असं उत्कृष्ट, नवीन आणि जुनं साहित्य , हे ‘ई-बुक’ च्या स्वरूपात, उपलब्ध करून दिले पाहिजे. ग्रंथालयांची संख्या वाढली पाहिजे आणि आहेत त्या ग्रंथालयांची स्थिती सुधारली पाहिजे. मराठी भाषेतील लिखाणाला, डबघाईला आलेल्या प्रकाशन व्यवसायाला सरकारकडून अनुदान आणि प्रोत्साहन मिळालं पाहिजे. मराठीच्या उपभाषा असलेल्या कोंकणी, मालवणी, अहिराणी या भाषांतील साहित्य,मराठीच्या मुख्य प्रवाहात सामील करून घेतलं पाहिजे.
एकूण काय तर मराठी भाषा वृद्धिंगत करण्यासाठी प्रचंड राजकीय, सामाजिक आणि वैयक्तिक इच्छाशक्ती आणि सातत्यपूर्ण प्रयत्न यांची आवश्यकता आहे. आघाडीचे मराठी उद्योजक आणि सामाजिक संस्थांनीदेखील यासाठी आपला वाटा उचलला पाहिजे.
☆ # कितना हंसीन है मौसम… # ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर☆
कितना हसीन सफ़र है… साथी भी खुबसुरत है ये तो मौसम को भी खबर है…
“… हे देवा काय म्हणून हे कवि असलेलं ध्यान माझ्या नशीबी मारलंस! … त्याला तो निसर्ग, ते चंद्र तारे, निर्झराचे गाणे आणि पौर्णिमेचे चांदणे एव्हढे मिळाले कि त्याच्या कवितेला उधाण येते! … सारे सारे भोवतालचे जग विसरून जातो आणि कवि कल्पनेच्या जगात विहरत बसतो.. ना खाण्या पिण्याची शुद्ध ना घरच्या कामाची, ना घरातल्या माणसांची सुधबूध… सुचलेली कविता जोवर कागदावर उतरत नाही तोवर याची तंद्रीतून बाहेरच येत नाही! .. आपलं नुकतंच लग्न झालयं… दिसायला सुंदर आणि मनमोकळी स्वभाची गोड नि मृदू बोलणारी नवयौवयना बायको आहे… तिच्याशी दोन घटका प्रेमाचा वार्तालाप करायला हवा की नको? … आपण नाही तर तिच्याशी कोण बरे बोलणार? … त्या एकांतातल्या सलज्ज कुजबुजणे आपण दोघांनी शेअर करायचे नाही तर कोण करणार? … आणि आणि हे सगळं त्या मठ्ठ, बथ्थड कविच्या डोक्यात कोण कसं घालणार? … प्रेम होईना तुझ्याने हि का तक्रार सांगायची असते इतरांच्या समोर! … ते काय म्हणतील आपल्याला! … “
“अगं कवि हा सौंदर्याचा भोक्ता असतो ना! त्याच्या कवितेला देखील कुणीतरी प्रेरणा दिली तरच त्याची काव्य प्रतिभा फुलून येते ना! त्याची भावनोत्कटता, त्याचं शब्द प्रभुत्व आणि त्याच्या तरल हळवं संवेदनशील मनात एखादी कल्पना सुचते, रूजते तेव्हा त्याला सृजनशीलतेचा अलौकिक अनुभव येतो… तो सृष्टीच्या सौंदर्याने प्रभावीत होतो आणि दिन हो या रात हम रहे तेरे साथ… अशी त्याची झपूर्झा स्थिती होते! … मग तो ना घरचा ना दारचा त्याचं जगंच वेगळं असतं…
आणि काय गं तू आणि तो लग्नाच्या आधीपासूनच काॅलेजमध्ये असतानाच तुमचं जमलं होतं म्हणालीस ना तू.! .. कवि मनाचा आणि सुंदर सुंदर प्रेमभावनेने ओथंबलेल्या कविता रचून तुला तर त्याने आपल्या प्रीतीच्या पावसात चिंब चिंब भिजवून टाकले असंच म्हणायचीस ना तू? … आणि हे तर काहीच नाही तुला तर त्या नवरंग सिनेमातील संध्या सारखं त्याच्या कवितेची तूच तर प्रतिभा असा तुमच्या प्रेमाचा मोठा सन्मानच केला हे ही तूच आम्हाला सांगितलसं ना त्या वेळी! … आम्ही तुला त्यावेळेला सांगत होतोच की बाई गं हे कवि लोक वेडे असतात! … यांचं खरंखुरं प्रेम फक्त त्यांच्या कवितेवरच असतं… या मंडळींना संसार हवा असतो तो त्यांना त्यांची केअरटेकर घेणारं माणूस घरात असावं म्हणून… बाकी या स्वच्छंदी माणसाला काय गं? … पण तू मारे नाक उडवून आम्हाला सांगितलेस कि मी माझ्या सौंदर्याच्या जाळ्यात त्याला असं जखडून ठेवेन! माझ्या प्रेमाचं अस्त्र असं सोडेन कि त्याने कविता वगैरे विसरून जाईल आणि माझ्या पदराला सारखं धरून मागं मागं घेऊन जाईन… मग आता काय झालं तुमच्या लग्नानंतर? … का तुझं मोहीनी अस्त्र कुचकामी ठरलं! का तुझ्या प्रेमातलं सामर्थ्य पेबळं ठरलं? … का तू आता त्याची हक्काची लग्नाची बायको झालीच आहेस म्हटल्यावर त्यानं आता जाशी कुठे नवनवीत चोरा सारखं तुला वागवायला लागला! .. त्याचा तुला सांगताही येईना आणि सहन ही होईना त्रास होऊ लागल्यावर सारं आठवलं काय? … पण तुला आता आम्ही काय सल्ला देणारं.? .. तुझं तुलाच सारं निस्तारलं तर पाहीजे… बघ एकेक नव्या नव्या क्लुप्त्या काढून कवि नवरा मुठीत येतोय का पहा… आणि जोवर तुझ्या मनासारखं होत नाही तोवर एकच पालुपद त्याच्याजवळ अष्टौप्रहर गात रहा… आज मी रूसूनी आहे…!!!
☆ मला समजलेली संत तुकारामांची गाथा… भाग – ९ ☆ सुश्री अरुणा मुल्हेरकर ☆
अभंगांतून कळलेले संत तुकाराम(२)
आजच्या लेखातही अभंगातून कळलेल्या संत तुकाराम महाराजांविषयी
आपण बोलणार आहोत.
बोलावा विठ्ठल/ पहावा विठ्ठल/
करावा विठ्ठल/ जीवे भावे//
येणे सोसे मन/ झाले हाव भरी/
परती माघारी/ येत नाही//
बंधनापासूनी/ उकलल्या गाठी/
देता आली मिठी/ सावकाश//
तुका म्हणे देह/ भरीला विठ्ठले/
काम क्रोधे केले/ घर रिते//
विदुषी किशोरीताई अमोणकर यांनी हा अभंग त्यांच्या गोड गळ्यातून गाऊन अतिशय प्रसिद्ध करून ठेवला आहे.
या अभंगातून आपल्याला स्पष्ट दिसून येते की तुकाराम महाराजांची भक्ती आता सगुणाकडून निर्गुणाकडे जात चालली आहे. विठ्ठलाची भक्ती करत असताना या ठिकाणी त्यांची देहबुद्धी नाहीशी झालेली आहे. म्हणून ते म्हणतात, ” मी ब्रह्म आहे या भावनेच्या अवस्थेत माझा जन्म झाला. माझे सगळे नवस पूर्ण झाले व सर्व आशा नाहीशी झाली. मी आत्मा आहे या अनुभवाने बलवान झालो. “
मी ची मज व्यालो/ पोटा आपुलिया आलो/
आता पुरले नवस/ निरसोनी गेली आस/
दोन्हीकडे पाहे/ तुका आहे तैसा आहे//
काही जाणो नये /पांडुरंगाविण/
पावीजेल सीण/ संदेहाने//
भलतिया नावे/ आळविला पिता/
तरी तो गात्रा धणी/ हरी कथा//
तुका म्हणे उपजे / विल्हाळआवडी/
करावा तो घडी/ घडी लाहो//
एका पांडुरंगा व्यतिरिक्त कसलाच विचार करू नये. कोणत्याही कारणाने कळवळ्याने मारलेली हाक त्याच्यापर्यंत पोहोचते. हरी कथेने सर्वांगांचे समाधान होते. एक हरीकथाच आपल्या सर्व इच्छा पूर्ण करते.
अशाप्रकारे तुकारामांची अवस्था हरीमय झाली आहे.
म्हणून पुढे ते म्हणतात,
दास झालो हरिदासाचा/*बुद्धी काया मने वाचा/
तेथे प्रेमाचा सुकाळ/टाळ मृदुंग कल्लोळ//*
नासे दुष्ट बुद्धी सकळ/समाधी हरिकीर्तनी//
ऐकता हरी कथा/भक्ती लागे त्या अभक्ता//
देखोनी कीर्तनाचा रंग/ कैसा उभा पांडुरंग//
हे सुख ब्रह्मादीका/ नाही नाही म्हणे तुका//
हरी प्रेमाचे महत्त्व समजावून सांगण्यासाठी महाराजांनी बऱ्याच ठिकाणी रूपकात्मक अभंग रचना केली आहे.
या ठिकाणी ते म्हणतात…
रवीचा प्रकाश/ तोचि निशी घडे नाश/
झाल्या बहुवस तरी/ त्या काय दीपिका//
बंधमोक्षाचे वर्णन करताना महाराज रात्र आणि दिवस याची उपमा देतात. सूर्यप्रकाश आला की रात्र नाहीशी होते. अनेक दीप लावून रात्र संपत नाही. त्याप्रमाणेच सर्वोत्तम असा श्रीहरी तो माझ्या जीवात राहिला तरच त्याची सर्व रहस्य मला कळतील. ते दुसरा दृष्टांत देतात.
सवे असता धनी/ आड ये न सके कोणी/
नलगे विनवणी/ पृथकाची करावी//
प्रत्यक्ष मालकच आपल्याबरोबर असला तर वाटेत कोणाची विनवणी करावी लागत नाही, तसेच आपल्याजवळ श्रीहरीचे प्रेम असले तर आपल्या मार्गात काहीच अडथळे येत नाहीत.
म्हणजेच जन्म मरणाच्या बंधनातून आपण सहज मुक्त होतो.
या ठिकाणी तुकारामांना भक्ती सुखाबरोबर ब्रह्मसुख भेटले आहे.
नाम घेता मन निवे/ जीवे अमृतची स्त्रवे/
होताती बरवे /ऐसे शकुन लाभाचे//
मन रंगले रंगले/ तुझ्या चरणी स्थिरावले/
केलीया विठ्ठले/ ऐसी कृपा जाणावी//
*सुख भेटता आले सुखा/ निध सापडला मुखा/
तुका म्हणे लेखा/ आता नाही आनंदा//
सर्वत्र अवर्णनीय असा आनंद आहे.
जे गाती अखंड विठ्ठलाचे गीत/
त्यांचे पायी चित्तठेवीन मी//
जयासी विठ्ठल आवडे लोचनी/
त्याचे पायवणी स्वीकारीन//
विठ्ठलाची जीही दिला सर्व भावा/
त्यांच्या पायी जीव ठेवीन मी//
तुका म्हणे रज होईन चरणींचा/
म्हणावी ती त्यांच्या हरीचे दास//
तुकाराम भक्तिमार्गाला लागले आहेत, आता ते मायामोहातून बाहेर पडले आहेत, परंतु आपण संसार बंधनात अडकलो याचे त्यांना दुःख आहे. ते दुःख आपल्या अभंगातून व्यक्त करतात
पंचभूतांचे सापडलो संदी/
घातलीसे बंदी अहंकारे//
आपल्या आपण बांधविला गळा/
नेणेची निराळा असताही//
कासया हा सत्य मानीला संसार/
काहे केले चार माझे माझे//
का नाही शरण गेलो नारायणा/
का नाही वासना आवरिली//
किंचित सुखाचा धरीला अभिळास/
तेणे बहु नास केला पुढे//
तुका म्हणे आता देह देऊ बळी/
करुनी सांडू होळी संचिताची//
तुकारामांनी आपले सर्वस्व पांडुरंग चरणी वाहिले आहे आणि ते देवाच्या विविध कथांचा संदर्भ घेऊन विठ्ठलाला आळवीत आहेत.
फिरविले देऊळ जगामाजी ख्याती/
नामदेवा हाती दूध प्याला//
(नामदेवाने आपल्या भक्ती द्वारा विठ्ठलाचे देऊळ फिरवून प्रवेशद्वार आपल्यासमोर आणले अशी कथा आहे.)
भरियेली हुंडी नरसी मेहत्याची/
*धनाजी चाट्याची सेते पेरी//
मिराबाई साठी प्याला विषाचा/
लाख्याकोला त्याचा ढोल पिटी//
कबीराचे मागी विणू लागे शेले/
मूल उठविले कुंभाराचे//*
या सर्व संतांची कामे पांडुरंग स्वतः करत होता
त्याचप्रमाणे तुकारामांकडेही देवाने लक्ष द्यावे
म्हणून ते विनवणी करतात…
आता तुम्ही दया करा पंढरीराया/
तुका विनवी पाया वेळोवेळा//
विठ्ठल भेटीची तुकाराम महाराजांना किती तळमळ लागून राहिली होती हे आतापर्यंत अनेक अभंगातून आपण पाहिले. आता पुढील काही अभंगातून त्यांची व विठ्ठलाची भेट झाल्यानंतर त्यांच्या मनाची अवस्था पाहण्यासारखी आहे.
बहुता दिसांची आजी झाली भेटी/
झाली होती तुटी काळ गती//
येथे सावकाश घेईन ते धणी/
गेली अडचणी उगवोनी//
बहु दुःख दिले होते घरी कामे/
वाढला हा श्रमे श्रम होता//
बहु दिसत होता सांडीला मारग/
क्लेशाचा त्या त्याग आजी जाला//
बहु होती केली सोंग संपादणी/
लौकीकापासूनी निर्गमले//
तुका म्हणे येथे झाले अवसान/
परमानंदी मन विसावले//
पुष्कळ काळपर्यंत देवाच्या पायांचा वियोग झाला होता, आज सुदैवाने त्याची भेट झाली. आता सर्व अडचणी दूर होऊन, विठ्ठलाच्या पायाचे ध्यानसुख तृप्त होईपर्यंत घेईन. अनेक वैश्विक इच्छांनी मी दुःखी झालो होतो, त्यामुळे श्रम फार वाढले होते, ते आज संपले. प्रपंचात राहून अनेक सोंगे करावी लागली, आता सर्व लौकिक गोष्टींशी असलेला माझा संबंध संपला. मन मोकळे झाले. शेवटी सर्व व्यवहाराचे पर्यवसान एका परम आनंदात होऊन त्या ठिॅ
थौतकाणी माझे मन विश्राम पावले आहे. एक समाधानाची रेषा त्यांच्या मुद्रेवर या ठिकाणी दिसून येते.
दहावीच्या परीक्षा जवळ आल्या, की, मला शाम च्या १० वी ची जुनी आठवण हमखास होते. शाम हा माझा मित्र पुरोहित याचा मुलगा. त्यावेळेस पेपर ला बातमी असायची, की, कुणाच्या तरी आय कार्ड वर चुकून शाहरुख खान चा फोटो छापला होता, कुणाच्या आय डी कार्डवर ओबामा यांचा फोटो आला होता, वगैरे. अशा गोष्टींवर आपला सहसा, लगेच विश्वास बसत नाही, पण आमच्या श्यामच्या बाबतीत असेच काही घडले, त्यामुळे या गोष्टींवर विश्वास तर बसलाच, आणि ती घटना कायम मनात रुजली.
शाम पुरोहित त्यावर्षी वर्षी दहावीला बसला होता. शाळेतून फॉर्म मिळाला. शामनी फॉर्म भरला. काही चुकले नाही ना, हे बघायला, मित्रानी दोन वेळा फॉर्म तपासून पाहिला. आपल्या नवऱ्याचा स्वभाव वेंधळा आहे, हे माहीत असल्यामुळे, मित्राच्या बायकोने फॉर्म बरोबर भरल्याची पुन्हा खात्री केली. फॉर्म बरोबर फोटो पण पाठवायचा होता.
रिझल्ट लागल्यानंतर आपल्याकडे क्लासेस च्या जाहिराती आपण पेपरमध्ये बघतोच. आमच्या क्लासचा, अमित पुरंदरे बोर्डात पहिला आला, सीमा लांबे बोर्डात चौथी आली, सौरभ चोकटे ला तीन विषयात 98 मार्क, वगैरे वगैरे. त्या वर्षी परीक्षेचे फॉर्म भरायचे वेळेस, नव्यानेच फोटो स्टुडिओच्या जाहिराती सुरू झाल्या होत्या. गेल्या वर्षी परीक्षेच्या फॉर्म करता आमच्या स्टुडिओत फोटो काढलेला, कुणाल देशपांडे बोर्डात पहिला आला, शाम हिंगे पुण्यात पहिला आला, नेहा अवचटला गणितात १०० मार्कस, वगैरे वगैरे. मित्रानी सगळ्या जाहिराती बघून, फोटोकरता साई स्टुडिओ पसंत केला. चांगला मुहूर्त बघून सगळे शामला घेऊन स्टुडिओ मध्ये गेले. मित्राला डोळ्यासमोर पुढच्या वर्षीच्या पेपर मध्ये साई स्टुडिओची जाहिरात दिसायला लागली, फॉर्म करता साई स्टुडिओत फोटो काढणारा श्याम पुरोहित ठाण्यात पहिला.
फोटोग्राफर नी शाम कडे दोन-तीन अँगल्समधून बघितले, आणि स्टुडिओ मधला काळा कोट आणि लाल टाय घालून फोटो काढला.
शामनी शाळेत फॉर्म – फोटो जमा केले. बोर्डाकडून ऍडमिशन कार्ड आले. शामनी नाव वगैरे तपासून बघितले. आपला काळा कोट व लाल टाय बघितला.
म्हणता म्हणता परीक्षेचा दिवस उजाडला. देवाला, आई – वडिलांना नमस्कार करून, शाम शेजारच्या बाळू बरोबर सेंटरला गेला. बाळू यावर्षी पुनः परीक्षा देत होता. पर्यवेक्षकांनी बाळूचे कार्ड बघून त्याला आत सोडले. शामनी मनात देवाला नमस्कार केला आणि कार्ड पुढे केलं. पर्यवेक्षकांनी शामकडे बघितलं आणि कार्ड बघितलं, पुन्हा शामकडे बघितलं आणि कार्ड बघितलं. मग शाम ला विचारलं, ओबामा यांचे पूर्ण नाव काय आहे. शाम ला वाटलं, १० सारखी मोठी परीक्षा द्यायची आहे, म्हणजे जनरल नॉलेज आवश्यक आहेच. आत सोडण्यापूर्वी सर आपलं जी-के टेस्ट करत असतील. शाम नी लगेच उत्तर दिले ‘बराक ओबामा’. पुढचा प्रश्न आला – बराक ओबामा कुठे राहतात. शाम तयारच होता – व्हाईट हाऊस, वाशिंग्टन. मागच्या मुलांची चुळबुळ सुरु झाली, पण सरांशी पंगा नको, म्हणून सगळे चूप होते. पुढचा प्रश्न आला – बराक ओबामा आत्ता कुठे आहेत. या प्रश्नावर शाम गोंधळला.
त्यानी जी – के चा क्लास लावला होता. त्यामध्ये भारताचे आणि इतर देशांचे, राष्ट्रपती कोण आहेत, पंतप्रधान कोण आहेत, ते कुठे राहतात, त्यांनी देशाकरता काय महत्वाचे निर्णय घेतले, असे प्रश्न त्याचे झाले होते. पण अमुक व्यक्ती आता कुठे आहे, असा प्रश्न कधीच नव्हता. त्यामुळे शाम गोंधळला. लाईनमधला मागचा मुलगा स्मार्ट होता, तो म्हणाला सर, अमेरिकेचे अध्यक्ष केंव्हा कुठे असतील, हे गोपनीय असते. ते कुणीच सांगू शकणार नाही. सरांना उत्तर आवडले होते, पण लक्ष विचलित होऊ न देता, सर शाम ला म्हणाले, तुला उत्तर माहित नाही ना, मग चल हेडमास्तरांकडे.
चेंबरमध्ये गेल्यावर, पर्यवेक्षक हेडमास्तरांच्या कानाशी कुजबुजले – सर, याच्या कार्ड वर बराक ओबामा यांचा फोटो आहे. हेडमास्तरांनी आय – कार्ड बघितलं आणि शामकडे बघितलं, असं २-३ वेळा केल्यानंतर, कार्ड शाम ला दाखवत विचारलं, कार्डावर ओबामा यांचा फोटो आहे, ते आत्ता कुठे आहेत. शाम नी आय कार्ड बारकाईने बघितलं, तोच काळा कोट, तोच लाल टाय, पण आपला चेहेरा नाही, हे बघून शाम पण गोंधळला. हेडमास्तरांना वाटलं, की, ओबामा यांचं कार्ड आहे, म्हणजे, ते परीक्षेला नक्की येणार. कार्डावर नाव चुकू शकतं, पण फोटो चुकू शकत नाही, हा त्यांचा अनुभव. त्यांच्या वोटिंग कार्डवर फोटो त्यांचा होता, पण त्याचे नाव चुकीचे होते, तरी ते वोटिंग ला जायचे. त्यांच्या बायकोच्या एका कार्डावर, त्यांचे नाव वेगळेच आले होते. हेडमास्तरांच्या मनात मनसुबे सुरु झाले – ओबामा नक्की येणार, पेपर संपला की, त्यांच्या बरोबर फोटो काढू, आपला फोटो पेपरला येईल, वगैरे.
ओबामा यांना यायला उशीर होऊ शकतो, हे समजून सरांनी फर्मान काढले, की, ओबामा आल्यानंतरच पेपर सुरु होईल. त्यांनी शाम ला पुन्हा विचारले – ओबामा कुठे आहेत? ओबामा आत्ता कुठे असतील, या प्रश्नानी शाम परेशान झाला. शामला अमिताभ यांच्या कौन बनेगा करोडपती ची आठवण झाली. कुणाची मदत घेता आली, तर या प्रश्नाचे उत्तर कठीण नव्हते. कुठलीही अडचण आली, की, आपल्याला राम – कृष्ण – शंकर आठवतात. पण यांना सोडून, शाम नी अमिताभ यांचा धावा सुरु केला. असं म्हणतात, की, ज्या गोष्टीचा, आपण आतल्या मनापासून धावा करतो, सृष्टी ती गोष्ट आपल्यापुढे साकार करते.
झाले अगदी असेच. सगळे आपापल्या ‘खयालोंमें’ असतांना, अचानकच एक प्रोड्युसर, त्यांची टीम आणि स्वतः अमिताभ केबिन मध्ये अवतरले. प्रोड्युसरनी, आधी सूचना न देता आल्याबद्दल, सरांची आधी माफी मागितली. त्यांना डोक्याला लावायच्या लाल तेलाची ऍड करायची होती. पेपर संपल्यानंतर, अमिताभजी एका मुलाच्या डोक्याला लाल तेल लावतील, आणि एक डायलॉग म्हणतील. आम्ही शाळेला देणगी देऊ, अशी कल्पना सरांना प्रोड्युसरांनी दिली.
शामला वाटले, की, आपल्या हाकेला ऐकूनच अमिताभ आले आहेत. शामनी हिम्मत करून, अमिताभ यांना गळ घातली, की, त्यांच्या हेल्प लाईन च्या मदतीने, त्यांनी, बराक ओबामा आत्ता कुठे आहेत, याचे उत्तर सरांना द्यावे. अमिताभ म्हणजे एव्हर ग्रीन आणि रिसोर्सफूल पर्सन्यालिटी. अमिताभनी हा – हा जरूर, असे म्हणायचा अवकाश, आणि प्रोड्युसरनी लगेच, कौन बनेगा करोडपती चा मिनी सेट लावला. अमिताभनी करोडपती स्टाईलने सुरुवात केली – शामजी किसकी मदत लेना पसंद करेंगे. फोनाफ्रेंड या ऑडियन्स की? आपने आभितक किसीभी हेल्प लाईन का इस्तेमाल नही किया है. शाम नी विचार केला, कि ऑडियन्स ची मदत घेण्यात काही अर्थ नाही. हेडमास्तरांना आणि पर्यवेक्षकांनाच हा प्रश्न आहे, त्यामुळे ते दोघे कट. बरं, अमिताभ यांची टीम आत्ताच इथे आली आहे, त्यामुळे त्यांना पण ओबामा आत्ता कुठे आहेत, ही कल्पना नसणार. अमिताभ नी शाम च्या मनातली चलबिचल ओळखली, आणि म्हणाले, क्या आप फोनाफ्रेंड से पूछना पसंद करेंगे? शाम ला हा पर्याय आवडला.
अमिताभ : किससे पूछना चाहोगे?
शाम चे विचारचक्र सुरु झाले – बाबांना विचारावे का? नाही, नाही. आत्ता आई कुठे आहे, हे पण त्यांना माहित नसते, ओबामांचे ते काय सांगणार! ओबामा यांनाच फोन लावला तर काय हरकत आहे? पण सरकारी ऑफिस मध्ये फोन लागेल कां? बाबा बऱ्याच वेळेला काही माहिती विचारायला, एल आय सी ऑफिस ला फोन करतात, कधी पेन्शन ऑफिस ला फोन करतात, कधी कार्पोरेशन च्या ऑफिस ला फोन करतात, पण दिवस दिवस त्यांचा फोन लागत नाही. एकतर रिंग वाजत राहते आणि कुणी फोन घेत नाही, किंवा कायम एंगेज टोन येतो. पण कौन बनेगा मध्ये, कुठलाही फोन लावला, तरी २ किंवा ३ रिंग जातात आणि पलीकडचा फोन उचलतो. म्हणजे ओबामा यांना फोन लावायला काहीच हरकत नाही!
शाम : अमिताभ सर, मै ओबामाजी से पुछना चाहता हू
अमिताभ : पक्का, लॉक किया जाय?
शाम : हा, सर. पक्का
अमिताभ : कॉम्प्युटरजी, बराक ओबामा जी को फोन लगाया जाय.
टीम तयारच होती. लगेच रिंग चा आवाज आला आणि अहोआश्चर्यम म्हणजे पलीकडून आवाज आला, यस् ओबामा हियर
अमिताभ : सर, गुड मॉर्निंग, धिस इज अमिताभ बच्चन फ्रॉम इंडिया, ठाणे हायस्कुल
ओबामा : शाम, यु कॅन स्पिक इन मराठी, माय इंटरप्रिटर विल ऐनसर
शाम जाम खुश झाला.
शाम : सर, माझ्या आय कार्ड वर तुमचा फोटो आहे. तुम्ही परीक्षेला याल असे सरांना वाटते, तुम्ही सध्या कुठे आहात?
ओबामा (ऑफिस) : मी आत्ता ऑफिस मध्ये आहे. मला नुकतीच मुंबईच्या कॉन्स्युलेटकडून माहिती मिळाली, की, तुमच्या कडे काही जणांच्या आय कार्डवर माझा फोटो आला आहे. मी तिथल्या परीक्षेला नक्कीच बसत नाही, हे सरांना सांग. याला दोन कारणे आहेत, एक म्हणजे, तिथल्या प्रश्नपत्रिकेत बऱ्याच चुका असतात, त्यामुळे उत्तर लिहितांना गोंधळ होतो. आणि दुसरे म्हणजे, पेपर तपासायची वेळ आली, की, तिथले शिक्षक संपावर जातात, आणि मग कुणीही पेपर तपासतो.
सरांना सांग, की, जरी माझा फोटो आय कार्ड असला, तरी ज्याचे नाव कार्ड वर आहे, त्याला परीक्षेला बसू द्यावे.
फोन कट झाला.
ओबामा यांना आपल्या परीक्षेबद्दल इतकी इत्यंभूत माहिती आहे, याबद्दल सगळ्यांनीच आश्चर्य व्यक्त केले.
सरांनी शाम ला कार्ड परत केले, आणि पेपरला जायला सांगितले. पर्यवेक्षक म्हणाले, सर, परीक्षेची वेळ संपली आहे. आपण परीक्षा होल्ड वर ठेवली होती. इतर सेंटरची मुले पेपर संपवून बाहेर पण आली असतील. हेडमास्तरांनी लगेच निर्णय दिला, की, आजचा पेपर सगळ्यांनी दिला असे समजण्यात येईल. आणि बेस्ट ऑफ फाईव्ह चे ऍव्हरेज मार्क या पेपरला दिल्या जातील. शाळेतल्या मुलांनी टाळ्या वाजवत, आपापल्या घराकडे धूम ठोकली.
पेपर संपला, हे ऐकताच प्रोड्युसरची टीम पुढे आली. हेडमास्तरांची खुर्ची मध्ये ओढण्यात आली. शाम ला त्यावर बसवले. सायलेंस – लाईट्स ऑन – कॅमेरा रोलिंग, हे डायलॉग सुरु झाले. अमिताभनी लाल तेलाची बाटली उघडली आणि श्यामच्या डोक्यावर तेलाची धार सोडली. थंडा थंडा – कुल कुल असे म्हणत थोडे मॉलिश केले, आणि ‘सरको लाल तेल लगाओ और एक्झाम का टेन्शन खतम’, हा डायलॉग आपल्या शैलीत म्हटला. कट – कट अशी घोषणा झाली. सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या.
प्रोड्युसर नी मुलांच्या ट्रिप करता सरांकडे १०, ००० रु चा चेक दिला. शाम ला १००० चा चेक दिला. आणि अमिताभला १ लाख चा चेक दिला
शाम नी फोनकडे बघून ओबामा यांना नमस्कार केला. अमिताभ यांना नमस्कार केला. सरांना आणि पर्यवेक्षकांना नमस्कार केला आणि लाल तेलाच्या नशेत, हवेत तरंगत घर गाठलं.
☆ ‘Mandatory की Optional??…’ ☆ सुश्री संध्या बेडेकर ☆
Growing old is mandatory but getting old is optional.
काल ताईकडे सहजच गेले. दिवसभर खूप गप्पा टप्पा झाल्या. कूठून कुठपर्यंत गप्पा जातात. हे कळतच नाही. किती तरी विषयांवर चर्चा होते. आठवून बघावे तर आठवतही नाही. तरी अनेक विषय बोलायचे / सांगायचे राहूनच जातात. काही विषय तर नेहमीचेच असतात. तेच तेच बोलण होत. तरी बोलतो. सर्वात महत्वाचं म्हणजे गप्पा झाल्या की मजा येते. पोट भरल्यासारखे वाटते. समाधान होत. अनेक प्रश्न सुटतात. अनेक शंका दूर होतात. •••
संध्याकाळी घरी जायला निघणार, तर आज सर्वांचाच खूप आग्रह झाला की आज मी येथेच रहावे. अजय अनिता, भाऊजी सर्वांनीच थांबवून घेतले. •••
कारण काय तर म्हणे, •••तर जवळच एक उडपी हॉटेल उघडले आहे. तेथे उद्या संध्याकाळी जेवायला जाऊ. नंतर अजय मला घरी पोहचवेल. •••
त्यामुळे रहाणे झाले. आणि ताईकडील सकाळ ची घाई गडबड बघायला मिळाली.
तशी प्रत्येकाच्याच घरी एका विशिष्ट पद्धतीने सकाळची गडबड असते. रोज तीच काम, त्याच क्रमाने करायची असतात. अगदी त्या त्या कामाची वेळ पण ठरलेली असते तरी लग्न घाईच असते. तेच, तसेच डायलॉग असतात. त्यात जर लहान शाळेत जाणारी मुल असतील तर मजाच असते. •••
संध्याकाळी अजयने अनयला शाळेची तयारी करायला सांगितले. •••
अनयने होमवर्क केल्यावर आपला बस्ता लावला. कंपॉस बॉक्स चेक केला. बूट पॉलिश केले. त्याबरोबरच बाबांचे, आजोबांचे पण बूट पॉलिश केले. •••
अजय अनिताने पण दुसऱ्या दिवशीची तयारी केली. ताई ने मावशींकडून सकाळच्या नाश्त्याची, डब्याची तयारी करून घेतली. •••
सकाळचा अलार्म वाजला आणि सगळेच वेळेवर उठले. •••
अजय, अनय ने सुर्य नमस्कार घातले. अनिताने पण व्यायाम केला. सर्वांच्या आंघोळी झाल्या. देवाला नमस्कार करून झाला. तोपर्यंत नाश्ता तयार झाला. आधी सर्वांचे चे डबे भरणे, नाश्ता झाला.
शांतपणे सर्व आपापल्या कामाला निघाले.
अनय आजोबांना म्हणाला, •••
आजोबा!! आल्यावर रामायणातील गोष्ट सांगायची आहे. •••
आजोबा म्हणाले, ••• Yes!! छान लक्ष देऊन अभ्यास कर. नंतर गोष्ट नक्की. •••
अजय म्हणाला, ••• बाबा!! आज बॅंकेत गेला तर माझ काम करून या. •••
आता घरी आम्ही तिघेच होतो. •••
यानंतर आमची सकाळची काम सूरू झाली. ताई भाऊजींचा व्यायाम, चहा नाश्ता पूजा.
नंतर भाऊजींचे पेपर वाचन, शेयर मार्केट चे उतार चढाव बघण. बॅंकेत जाऊन आले. येताना ताईने दिलेल्या लिस्ट प्रमाणे सामान आणले. ••••
आमच्या पुन्हा गप्पांचा 2 nd round झाला. जेवण झाली. झोप झाली. •••
दिवसाचा दुसरा पार्ट सुरू झाला. चहा पाणी झाले. भाऊजींनी लॅपटॉपवर काम केले. तेवढ्यात अनय आला. लगेच बस्ता जागेवर ठेवला. डबा धुवायला म्हणून बेसीन मध्ये ठेवला. मोजे धूवून टाकले. युनिफॉर्म बदलला. आजीने दूध बिस्किटे दिली, दूध पिणे झाल्यावर आजोबांना शाळेत काय काय झाले ते सांगितले. होम वर्क काय आहे?? ते सांगितले. •••
आजोबांच्या जवळ गोष्ट ऐकायला बसला. आजोबांनी छान गोष्ट सांगीतली. त्याच्या अनेक प्रश्नांची शांतपणे उत्तर दिली.
राम कडून, हनुमानाकडून आपण काय शिकू शकतो. त्या गोष्टीचा वर्तमानात घडणाऱ्या गोष्टींच्या संदर्भात आपण काय कराव? कस वागाव? हेंही सांगीतले. ••••
थोडक्यात आयुष्याचे धडे अनयला दिले. •••
आजोबा नातवाचा तो बॉन्ड बघून खूप छान वाटल. ••••
खरंतर ही बऱ्याच घरातील सर्व सामान्य गोष्ट आहे. पण घरातील सकाळ ते संध्याकाळ पर्यंत घडणाऱ्या गोष्टी एवढयाच सहजतेने घडतात का?? ••••
मी ताईला विचारल, ••• अग!! हा तुमच्या घरचा रोजचा कार्यक्रम आहे का?? •••
ताई म्हणाली, ••••
हो, जवळपास रोजच. •••
अजय अनिता चे आॅफिस, अनय ची शाळा त्यामुळे routine हेच असते. अनयला पण शिस्त लावली आहे. त्याच्या सवयींकडे लक्ष असत आमच्या सर्वांचे. •••
आजोबांनी रोज गोष्ट सांगावी. अस अजय अनिता चे म्हणणे असते. त्यामुळे एखादी motivational गोष्ट किंवा महाभारत, रामायणातील गोष्ट किंवा कधी त्यांच्या बालमनातील समस्येवर लागू पडणारी गोष्ट आजोबा सांगतात. त्याच्या बरोबर आम्ही सर्वच खूप गप्पा मारतो. त्यामुळे तो काय विचार करतो. त्याच्यावर होणारा संगतीचा असर सर्वच लक्षात येत. ••••
रामरक्षा, इतर स्तोत्र म्हणून घेणे ही माझी जबाबदारी आहे. •••
मावशींकडून काम करून घेणे ही पण माझी जबाबदारी असते. •••
जी काम आम्हाला सहज जमतात, ती आम्ही आनंदाने करतो. •••
अग!! म्हणतात ना, •••
Growing old is mandatory but getting old is optional. •••
I will run,
if not I will walk,
if not I will crawl.
But I will move forward. •••
– – हाच नियम आम्ही पाळतो. •••
Team work किती महत्वाचे असते. हे या घरच्या activities बघून कळते. ••
म्हणतात ना. •••
**Alone you can win the match but, if you have a good team, you can win Tournament. **
रोजच्या किती तरी गोष्टी Team work ने सहज पूर्ण करता येतात. •••
शेवटी तडजोड आणि समजूतदारपणा याच दोन गोष्टी महत्त्वाच्या असतात. •••
पंच्याहत्तर वर्षाचे भाऊजी आणि सत्तर वर्षाची ताई कडे काही समस्या / Problems नसतील का?? •••
पण म्हणतात ना, •••
Happiness is not the absence of Problems, It is the ability and the team work to deal with them.
सकाळची वेळ, किचनमध्ये स्वयंपाकाची गडबड. आईनं पोहे प्लेटमध्ये ठेवून दहा मिनिटं झाली. तीन-चार वेळा हाका मारल्या पण अंकितानं एकदाही उत्तर दिल नाही. तेव्हा संतापलेल्या आईनं हातातला मोबाइल हिसकला. अंकिताला भयंकर राग आला. आईवर मोठ्या आवाजात खेकासली “काय कटकट ये. फोन दे”
“देणार नाही. उठून तास झाला. फोनमध्येच तोंड घालून बसलीयेस. बाकी काही काम नाही. खाऊन घे. ”
“मला भूक नाही. फोन दे महत्वाचं काम आहे. ”
“रील्स पाहून पोट भरणार नाही. तुझ्या भल्यासाठीच सांगतेय. ”
“माझं मी बघेन. उगीच डोकं फिरवू नकोस. फोन दे नाहीतर.. ”
“काय करशील”आईनं म्हटल्यावर राग अनावर झालेल्या अंकिता जोरात किंचाळत हाताला येईल त्या वस्तू फेकल्या. वाट्टेल ते बडबडत थेट आईच्या अंगावर धावून गेली. लेकीचं अनपेक्षित वागणं पाहून प्रचंड धक्का बसलेल्या आईनं फोन पुढे केला. अंकितानं झडप घालून फोन घेतला “परत माझ्या फोनला हात लावलास ना तर बघ. ”आईच्या डोळ्यात पाणी आलं त्याचवेळी अंकिता रील्स पाहत हसत होती.
प्रसंग दोन :
दुपारची वेळ असल्यानं गाड्यांची वर्दळ कमी होती. उड्डाणपूलावरून स्कूटरस्वार हेल्मेटधारी सुधीर चाललेला. अचानक विरुद्ध दिशेनं तूफान वेगानं येणाऱ्या बाईकला पाहून सुधीर गडबडला. कशीबशी टक्कर टाळली पण दोघंही तोल जाऊन पडले.
“तुला मरायचं तर एकटा मर. दुसऱ्याला का घेऊन जातोय. गाडी अशी चालवतात का? ”
“गाडी कशी चालवायची हे सांगणारा तू कोण?? माजं मी बगेन. रस्ता काय तुझ्या बापाचाय का? ”
“मग तुझ्या बापाचा आहे का? . एकतर रॉन्ग साइडनं आलास. वर माज दाखवतो”सुधीरच्या बोलण्यानं भडकलेला बाईकवाला अंगावर धावून आला. तेव्हा इतर गाडीवाल्यांनी मध्ये पडत दोघांना शांत केलं.
“गप जा. डोकं फिरवू नकोस. ”संतापानं फणफणणारा बाईकवाला म्हणाला. त्याचा एकूणच अवतार आणि आविर्भाव बघून नादी लागण्यात अर्थ नाही हे लक्षात आल्यानं सुधीर तिथून निघाला. तेव्हा बाइकवाल्याची हातवारे करत बडबड सुरू होती.
प्रसंग तीन :
फोनची वाजणारी रिंग किचनमध्ये कामात असलेल्या सुमाला ऐकू आली नाही. तीन-चार वेळा फोन करूनसुद्धा फोन घेतला नाही म्हणून दीपक जाम वैतागला. घरात पाऊल ठेवल्याबरोबर त्यानं आरडाओरड सुरू केली. “हजारवेळा सांगितलं की फोन घेत जा. ”
“फोन वाजेलला लक्षातच आलं नाही”
“अंताक्षरी खेळण्यासाठी फोन केला नव्हता”
“मी सुद्धा मुद्दाम केलं नाही. कामात होते. ”
“लक्ष कुठं असतं. कसल्या तंद्रीत असतेस”
“गाढ झोपले होते म्हणून मुद्दाम फोन घेतला नाही. आता बोला. इतकं काय अति महत्वाचं काम होतं. ” सुमाच्या तिरकस बोलण्यानं म्हणाली तेव्हा दिपकचा पारा अजून चढला. तोंडाला येईल ते बोलायला लागला. शब्दाला शब्द लागून दोघांत कडाक्याचं भांडण झालं.
—-
– – वरील घटना काल्पनिक असल्या तरी आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या आहेत. कोणाही सोबत असं होऊ शकतं. तीनही प्रसंगात कोण बरोबर कोण चूक याहीपेक्षा महत्वाची बाब म्हणजे “राग” आणि वागण्यातली आक्रमकता हाच खरा चिंतेचा विषय आहे.
रागावर कंट्रोल नाही हाच अनेकांचा मोठ्ठा प्रॉब्लेम झालाय.
‘राग येणं’ हे जरी नैसर्गिक असलं तरीही आजकाल आपण लगेच चिडतो, संतापतो.
आणि त्यासाठी कोणतंही निमित्त पुरतं. फार लवकर रिअॅक्ट होतो.
अनेकदा डोकं तापलं की संयम सुटतो. तारतम्य राहत नाही. शांतपणे विचार करण्याची इच्छाशक्ती आणि कुवत जवळपास संपलीये.
क्षुल्लक गोष्टींसाठी टोकाची भूमिका घेऊन परिणामांचा विचार न करता भावनेच्या भरात कृती केली जाते.
—
पूर्वी सुद्धा लोक चिडायचे, रागवायचे पण प्रतिक्रिया आजच्या इतक्या तीव्र नव्हत्या.
शिवीगाळ, धमकी, अंगावर धावून जाणं, मारहाण, अगदी जीव घेणं. असे प्रकार घर, ऑफिस, सार्वजनिक ठिकाणी सर्रास होतायेत.
पेपरमध्ये त्याविषयीच बातम्या आणि सोशल मिडियावर सुद्धा तेच.
आदर, संयम, समजूतदारपणा आता सुविचारापुरते मर्यादित झालेत. याचा वास्तवात फारसा कोणी वापर करत नाही.
धावपळ, तणाव, एकटेपणा आणि आभासी जगाचा कैफ यात गुरफटलेलं आयुष्य जगताना सतत अस्थिर असलेलं मन.
माणसा – माणसातील प्रत्यक्ष संवाद आणि त्यातली सहजता संपलीयं.
जिथं तिथं फक्त आणि फक्त स्वतःचाच विचार करण्याच्या नादात सगळंच बिघडलंय.
अनाकलनीय होतं चाललयं.
—
एकुणात सारांश असा की आपण खूप “चिडके” झालोय.
ऐकलेल्या प्रत्येक गोष्टीवर विश्वास ठेवणारे जसे हलक्या कानाचे तसेच कशावरूनही चिडणारे *“हलक्या डोक्याचे”* – – आजच्याच भाषेत बोलायचं तर ‘अँग्री बर्डस’
☆ ।। श्री नारद उवाच ।। – नारद भक्ति सूत्रे — सूत्र ४७ ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले☆
।। श्री नारद उवाच ।।
नारद भक्ती सूत्र क्र. ४७
यो विविक्तस्थानं सेवते, यो लोकबन्धमुन्मूलयति, निस्त्रैगुण्यो भवति, योगक्षेमं त्यजति ॥ ४७ ॥
अर्थ : जो एकांतवासाचे सेवन करतो, लौकिक संबंधांमुळे निर्माण झालेली बन्धने तोडून टाकतो, जो तीन गुणांनी रहित होतो आणि जो योग व क्षेमाचाही त्याग करतो, तो माया तरून जातो.
विवेचन : साधनाचा विचार करीत असता त्याचे अंतरग व बहिरंग असे प्रकार संभवतात हे पूर्वी सांगितलेच आहे. अंतरंगसाधनांना बहिरंग-साधनाची आवश्यकता असते. संगत्याग हे साधन मागील सूत्रात सांगितले आहे ते सिद्ध होण्याकरिता या सूत्रात ‘विविक्त स्थानं सेवते’ म्हणजे निर्जन एकांतवासाचा आश्रय करतो असे सांगितले आहे. याचा उल्लेख गीतेमध्ये आढळतो.
“कांहीं गल्बला कांहीं निवळ । ऐसा कंठीत जावा काळ । जेणेंकरितां विश्रांती वेळ । आपणासी फावे ॥”
(दास. १९. ०८. २९)
अनेक लोकांना एकांत शब्द सोडून देऊ, एकटं राहण्याचीही भीती वाटते. या भीतीमागील एक कारण हे असू शकते की त्यांना आपण एकटेच आहोत या *भीती*ची भीती वाटतं असते. एकांत हा शब्दाबद्दल एक गैरसमज आहे. एकटे रहाणे म्हणजे एकांत. मनुष्य एकटा राहतो. दिसायला तो एकांतात दिसतो, पण स्वतःच्या मनात तो मनोराज्य रचत असतो. याला खरा एकांत म्हणता येत नाही आणि अशा एकांताचा त्या मनुष्याला काहीही लाभ होत नाही. उलट असे करून स्वतः च स्वतःची फसवणूक करून घेत असतो.
एकांताची समर्पक व्याख्या पुढील प्रमाणे करता येईल. “एकाचाही अंत म्हणजे एकांत. “
संत तुकाराम महाराजांच्या चरित्रात याचे वर्णन आहे. ते भंडाऱ्याच्या डोंगरावर जाऊन एकांताचा अनुभव घेत असतं. ते स्वतःला इतके विसरून जात की जंगलातील पक्षी एखादे झाड समजून त्यांच्या अंगावर खांद्यावर खेळत असतं, बागडत असतं. तेथील लता, वेली त्यांची सोयरी झाली होती.
“वृक्षवल्ली आम्हां सोयरी वनचरे । पक्षीही सुस्वरे आळविती ।।१।। तेणे सुखे रुचे एकांताचा वास । नाही गुणदोष अंगा येत ।।२।।”
साधकाने कोणतेही साधन करावा, चिंतन करावे, ध्यान, भजन असो, मन एकाग्र झाल्या शिवाय त्यात गती प्राप्त होत नाही. अनादिकालीन संस्कारामुळे साधकाचे मन चंचल असते हे प्रसिद्ध आहे. त्याला निश्चळ बनवण्याकरिता काही साधने करावी लागतात.
साधकाच्या चित्तक्षोभाची बाह्य कारणेही दूर होणे आवश्यक आहे. ती विघ्ने म्हणजे स्वजन-परजनांकडून होणारा संसर्ग. तो अनेक प्रकारचा असू शकतो. तो गावातल्या त्या गजबजाटात राहून दूर करता येत नाही, सर्वावर नियंत्रण कसे ठेवता येईल? याकरिता तो संसर्ग टाळणेच अवश्य आहे. या दृष्टीने विविक्त स्थान म्हणजे एकांतवासाचा आश्रय त्या साधकाला घ्यावा लागतो.
(अभंग क्रमांक ३१९५, सार्थ तुकाराम गाथा, धार्मिक प्रकाशन संस्था)
सूत्राच्या पुढील भागात ‘या लोकबन्धमुन्मूलयति‘ असे नारद म्हणतात.
श्रीसद्गुरू गोंदवलेकर महाराज म्हणायचे की परमार्थाला आपल्या घरापासून सुरुवात करावी. मंदिरातील मूर्तीत राम आहे आणि माझ्या घरातील माणसांमध्ये तो नाही असे कसे होऊ शकेल? पुत्रेषणा, दारेषणा, वित्तेषणा यापेक्षाही साधक-भक्ताला लोकेषणा बाधक असते. लोकानी स्तुती करावयास आरंभ केला की तीच प्रिय वाटावयास लागते. पण स्तुतीबरोबर हळूहळू निंदाही होण्याला सुरुवात होते, ज्याला स्तुतीने सुख वाटते त्याला निंदा ऐकून दुःख झाल्याशिवाय राहत नाही. हाच लोकबन्ध होय. श्री जगन्नाथ कुंटे यांच्या एका पुस्तकात उल्लेख आहे. निंदा गोड वाटू लागली म्हणजे साधक पक्का झाला. जोपर्यंत साधकाला स्तुती गोड वाटते, तोपर्यंत तो भगवंतापासून खूप दूर आहे असे समजायला हरकत नाही.
पतितपावना देवराया ॥१॥
संसार करितां म्हणती हा दोषी ।
टाकितां आळसी पोटपोसा ॥ध्रु. ॥
आचार करितां म्हणती हा पसारा ।
न करितां नरा निंदिताती ॥२॥
*
संतसंग करितां म्हणती हा उपदेशी ।
येरा अभाग्यासि ज्ञान नाहीं ॥३॥
*
धन नाहीं त्यासि ठायींचा करंटा ।
समर्थासि ताठा करिताती ॥४॥
*
बहु बोलों जातां म्हणति हा वाचाळ ।
न बोलतां सकळ म्हणती गर्वी ॥५॥
*
भेटिसि नवजातां म्हणती हा निष्ठुर ।
येतां जातां घर बुडविलें ॥६॥
*
लग्न करूं जातां म्हणती हा मातला ।
न करितां जाला नपुंसक ॥७॥
*
निपुत्रिका म्हणती पहा हो चांडाळ ।
पातकाचें मूळ पोरवडा ॥८॥
*
लोक जैसा लोक धरितां धरवे ना ।
अभक्ता जिरे ना संतसंग ॥९॥
*
तुका म्हणे आतां ऐकावें वचन ।
त्यजुनियां जन भक्ति करा ॥१०॥
संत तुकाराम महाराज शेवटच्या चरणात सर्वाना सांगतात की, जनाचा त्याग करून त्यांचा संसर्ग स्वकीय, परकीय, शिष्य, भक्त म्हणविणारे असोत का विरोधी असोत टाळून भक्ती करा.
निस्त्रैगुण्यो भवति’
“प्रकृतीपासुनी होती गुण सत्त्व_रजस_तम|
ते निर्विकार आत्म्यास जणू देहांत जुंपिती||”
(गीताई १४. ०५)
सत्त्वगुण सुखसंग व ज्ञानसंगाच्याद्वारा बांधतो, रजोगुण हा आसक्ती काम याच्या द्वारे बांधतो. तमोगुण पूर्ण अज्ञान, मोह, प्रमाद, आलस्य, निद्रा इत्यादिकांच्या द्वारे जीवास बांधतो. जसा मासा हा आमिषाच्या आशेने स्वतःच्या प्राणघातक अशा गळाला अडकतो तसाच क्षेत्रज्ञ जीव या गुणाच्या जाळ्यात अडकतो. गुण म्हणजेच सर्व संसार आहे. कारण सचेतन-अचेतन सर्व सृष्टीही गुणात्मकचआहे, असेच श्रीकृष्णांनी अर्जुनास सांगितले आहे. भक्ताला गुणातीत बनावयाचे असते. त्याला तीन गुणांहून अतीत अशा निर्गुण भक्तियोगाचा आश्रय करावयाचा असतो. तसेच त्रिगुण आले की ते आपला एक प्रकारचा अहंकारही घेऊन येतात. तोही भक्तिमार्गाला प्रतिबंधक आहे म्हणून नारद ‘निस्त्रैगुण्यो भवति’ असे म्हणतात.
योग क्षेम त्यजति
संसारामध्ये बहुतेक जीवाना आपल्या निर्वाहाची चिंता लागलेली असते. जीवनावश्यक पदार्थ अनेक असतात, ते मिळतील का व प्राप्त झालेले टिकतील का ही जीवनाची एक महान समस्या आहे. अप्राप्त वस्तूची प्राप्ती व्हावी व प्राप्त आणि अनुकूल वस्तूचा नाश न व्हावा, त्या आपल्या म्हणून आपणाजवळ अखंड राहाव्या या भावनेला योगक्षेम म्हणतात. अप्राप्ताची प्राप्ती म्हणजे योग व प्राप्ताचे रक्षण हा क्षेम असा योगक्षेम शब्दाचा सामान्य अर्थ आहे. या योग-क्षेमाच्याच विवंचनेत बहुतेक माणसे गढून गेलेली आहेत. तसेच अप्राप्त पदार्थाच्या प्राप्तीला काही मर्यादा घालता येत नाहीत, व ते प्राप्त होण्याकरिता सतत प्रयत्नशील राहावे लागते. नाना प्रकारची शुभाशुभ कर्मे करीत रहावे लागते आणि प्राप्ताच्या संरक्षणाकरिताही थोडे श्रम करावे लागत नाहीत. एखादा साधकदेखील या योग-क्षेमाच्या चिंतेने ग्रस्त होणे शक्य आहे. पण ज्याला मायेतून तरून जावयाचे आहे त्या साधकाने आपल्या देहभरण – पोषणाची म्हणजेच लौकिक योग-क्षेमाची चिंता ठेवू नये. कारण देहाचे भरण – पोषण झाले तरी तेवढ्याने सर्व पुरुषार्थप्राप्ती झाली असे नाही. त्या भरण-पोषणातूनही पुन्हा अनेक विकार निर्माण होऊन ते जीवन अशांत बनवीत असतात.
भगवतांचे वचन आहे.
“अनन्य भावें चिंतूनि भजती भक्त जे मज| सदा मिसळले त्यांचा मी योग क्षेम चालवी||”
(गीताई ०९. २२)
मनुष्याला मिळणाऱ्या भौतिक गोष्टी प्रारब्धाने मिळत असतात. सर्वसंगपरित्याग केलेल्या साधकाची भूक आपसूक कमी होते. ज्याने जीभ जिंकली, त्याने अर्धा परमार्थ जिंकला असे म्हणतात.
– – संत तुकाराम महाराजांचा पुढील अभंग पुरेसा बोलका आहे.
साळंकृत कन्यादान ।
पृथ्वी दानाच्या समान ॥१॥
परि तें न कळे या मूढा ।
येईल कळों भोग पुढां ॥ध्रु. ॥
आचरतां कर्म ।
भरे पोट राहे धर्म ॥२॥
सत्या देव साहे ।
ऐसें करूनियां पाहें ॥३॥
अन्न मान धन ।
हें तों प्रारब्धा आधीन ॥४॥
तुका म्हणे सोसे ।
दुःख आतां पुढें नासे ॥५॥
पुढील सूत्रात आपण आणखी दोन गोष्टींचा कसा त्याग करायचा हे पाहणार आहोत. जय जय रघुवीर समर्थ
☆ “Not today! Not today!” ☆ श्री संभाजी बबन गायके ☆
Not today! Not today! Not today!.. आज मी मरणार नाही.. कुटुंबाला मरू देणार नाही!
… अगदी मागच्याच आठवड्यात त्याला केवळ साडेतीनशे मीटर्स अंतर पोहताना खूप दम लागला होता… त्यासाठी त्याने त्याच्या जलतरण प्रशिक्षकाची बोलणीही खाल्ली होती. आणि आज तर त्याच्यापासून किनारा सुमारे चार किलोमीटर्स दूर होता… आणि त्या समुद्रातल्या लाटा त्याला पुढे जाऊ देत नव्हत्या! पण त्याला तर किना-यावर पोहोचायचंच होतं… आज तो मृत्यूला शरण जाणार नव्हता… आणि त्याची आई आणि त्याचे दोन भावंडं अशा तिघांनाही मरणाच्या दारात सोडून येणार नव्हता!
ऑस्ट्रेलियामधील पर्थ शहराच्या दक्षिणेला २०० किलोमीटर्सवर असलेल्या क्विन्डालप या समुद्रकिना-यावर जिओग्राफी बे याठिकाणी केवळ तेरा वर्षे वयाच्या ऑस्टिनचे कुटुंब सुट्टीसाठी आलेले होते… आई जोन, त्याची आठ वर्षांची धाकटी बहिण आणि अकरा वर्षांचा धाकटा भाऊ असे तिघे होते. सुट्टीच शुक्रवार हा शेवटचा दिवस होता. परत जाण्याची तयारी झालीच होती… पण हाताशी आणखी थोडावेळ असल्याने त्यांनी समुद्रात फेरफटका मारण्यासाठी एक Paddle Board भाड्याने घेतला… हे रबरी बोर्ड्स हवा भरून फुगवले जातात… आणि हा बोर्ड वल्हे मारून चालवावा लागतो. या board वर ऑस्टिनची आई आणि त्याची दोन्ही भावंडं स्वार झाली… तर ऑस्टिनने स्वत:साठी कयाक बोट घेतली होती… निमुळती असलेली ही छोटीशी बोट वल्ह्याने वल्व्हावी लागते. या समुद्रसफरीला एक तासभर लागणार होता. ऑस्ट्रेलियन माणसं तशी दर्यावर्दी. खोल समुद्रात ते अत्यंत सहजतेने विहार करतात. पोहण्याचे शिक्षण हा त्यांच्याकडे शालेय शिक्षणाचा भाग आहे. समुद्रात बुडणा-या लोकांना वाचवण्यासाठी त्यांच्या समुद्र किना-यांवर विशेष जीवरक्षक तैनात असतात… हे आपण टी. व्ही. वरील बॉन्डाय रेस्क्यू कार्यक्रमात पाहिले असेलच.
ऑस्टिन छान कयाकिंग करीत होता… पण उत्साहाच्या भरात तो समुद्रात काहीसा जास्त पुढे जाऊ लागला… तसे त्याच्या आईने त्याला मागे बोलवण्यासाठी Paddle Board त्याच्या जवळ नेला. या प्रयत्नात तिचा Paddle Board पाण्यात पलटला आणि तिच्या हातातला एक वल्हे पाण्यात पडले आणि दूर वाहून गेले. आता सर्वजण पाण्यात होते… जोन ने कसाबसा तो paddle board सरळ केला आणि त्यावर तिघेही चढले… जोन Paddle Board एका वल्ह्याने वल्हवू लागली… पण तितक्यात समुद्रात जोराचा वारा सुटला, लाटा उफाणल्या आणि paddle board आणि कयाक यांना आत आत खेचू लागल्या…! आणि paddle board पुन्हा पलटी झाला… जोनच्या हातातलं दुसरं वल्हे सुद्धा पाण्यात पडले! ऑस्टिन त्याची कयाक घेऊन यांना वाचवण्यासाठी पुढे सरसावला… त्या तिघांना त्याने कयाकमध्ये ओढून घेतले… पण आता कयाक जड झाली… तिच्यात पाणी भरू लागले… मग या सर्वांनी पाण्यात उद्या घेतल्या… कयाक मधले पाणी समुदात खाली केले… आणि कयाक सरळ करीत पुन्हा तिच्यात चढले… पण आता लाटा आणखी जोरदार येऊ लागल्या… कयाक टिकेल असे वाटत नव्हते. पण तरीही कुणी फार घाबरले नव्हते! किनारा काही फार दूर नव्हता. शिवाय paddle board आणि कयाक ज्या हॉटेलने भाड्याने दिले होते… ते लोक… यांना उशीर झाला म्हणून यांना शोधायला येतीलच… असं जोन ला वाटलं! पण तसं काही घडलं नाही. चार तास उलटून गेले होते या संघर्षाला…
किना-यावर जवळपास कुणी नव्हतेच… आणि पुढे येणारी प्रत्येक लाट त्यांच्यातले आणि किना-यातले अंतर वाढवत वाढवत चालल्या होत्या. लाटा त्यांना तब्बल चौदा किलोमीटर्स अंतरापर्यंत घेऊन गेल्या होत्या… ओरडून काहीही फायदा नव्हताच… सर्वांच्या अंगावर Life Jackets होती… यामुळेच ते समुद्रात पडले तरी बुडणार नव्हते सहजी. परंतु वारा, थंड आणि खारे पाणी… आणि शार्क मासे! तरीही जोराचे प्रयत्न करीत हे कुटुंब किना-याकडे येण्याचा प्रयत्न करीत राहिले… दहा किलोमीटर्सचे अंतर त्यांनी पारही केले होते… सर्वांना आपण निश्चित किना-यावर पोहोचू, आपल्याला वाचवायला कुणीतरी येईल, असे वाटत होते. पण काहीच झाले नाही… अंधार पडण्याची चिन्हे होती… आपण किना-यापर्यंत पोहत जावे आणि मदत मिळवावी, असे जोनला वाटले… पण दोन लहान मुलांना असं समुद्रात सोडून येणं तिला पटेना… मग तिने एक निर्णय घेतला… ऑस्टिनने कयाक घेऊन किना-याकडे निघावे… आम्ही paddle बोर्ड धरून तरंगत राहू… त्याला पाठवावे! ऑस्टिनने कयाक पुढे काढली.. त्याच्याही अंगावर life jacket होतेच… तो नजरेआड झाला! लाटा कमी होण्याचे मात्र नाव घेईनात!
अंधार पडू लागला… आपण पोराला पुढे पाठवून चूक तर नाही ना केली? आईचं हृदय विचार करून रडू लागलं! बराच वेळ झाला… कुणीही मदतीला आलं नव्हतं!
इकडे ऑस्टिन कयाकने पुढे पुढे सरकत असताना त्याच्या लक्षात आलं की आपण काही फार पुढे जाऊ शकत नाही आहोत… त्याने पाण्यात उडी घेतली… पण life jacket सुद्धा जड झाले आहे… त्यामुळे पोहण्याचा वेग कमी होतो आहे.. त्याने ते काढून फेकले… आणि त्याला जितक्या पद्धतीने पोहता येत होते त्या त्या पद्धती त्याने अवलंबल्या… ब्रेस्ट स्ट्रोक, back stroke, survival swimming इत्यादी. त्याच्या मनात काय सुरु होतं यावेळी? मला आज किना-यावर पोहोचायचेच आहे… मी आज मरणार नाही… माझ्या कुटुंबाला मरु देणार नाही! ऑस्ट्रेलियन लोक today या शब्दाचा उच्चार साधारणत: to die असा करतात… पण ऑस्टिन मात्र not today… आज नाही… असं मनाशी म्हणत राहिला… त्याला त्याचे मित्र आठवत होते… त्याचं आयुष्य आठवत होतं.. शरीर बधीर होत चाललं होतं… आपण किती थकलो आहोत… हेही त्याला जाणवत नव्हतं… त्याला फक्त किनारा गाठायचा होता! इकडं समुद्रात असलेया जोन आणि तिच्या भावंडांनी आता आशा सोडायला सुरुवात केली… अंधार झाला होता!
ऑस्टिन किना-यावर पोहोचला… आणि कोसळला… पण दुस-याच क्षणी उठला… थकलेले पाय… वाळूतून धावू लागले… तिथून माणसं आणखी दीड दोन किलोमीटर्स दूर होती! जीवाच्या आकांताने ऑस्टिन धावला… पण त्याच्या दुर्दैवाने इंग्लीश भाषा समजू शकतील अशी माणसं त्या गर्दीत नव्हती… होती ती सारी परकीय पर्यटक माणसं होती… ऑस्टिनने आणखी पुढे धाव घेतली… फोन बूथ गाठला… ००० हा तातडीचा फोन डायल केला… आणि अगदी शांतपणे, आत्मविश्वासाने त्याची परिस्थिती कथन केली… मला हेलीकॉप्टर, विमान, बोट हवी आहे… माझी आई, माझे बहिण, भाऊ समुद्रात अडकलेत. त्याने बचाव पथकाला त्यांचा ठावठिकाणा नेमका कुठे असेल ते अचूक सांगितले… पण अंधार पडलेला होता… हेलीकॉप्टरने तो भाग पिंजून काढीत या लोकांना शोधलं… एक आधुनिक बोट त्यादिशेने भरधाव गेली… त्यांनी paddle board ळा धरून पाण्यात कसेबसे तग धरून राहिलेल्या त्या तिघांना वर उचलून घेतले… जोनने विचारले… ऑस्टिन? बचावकर्त्यांनी ऑस्टिन सुखरूप असल्याचे सांगितल्यावरच जोनचा जीव स्थिर झाला! किना-यावर पोहोचताच ऑस्टिनने जोनला आलिंगन दिले… भाऊ, बहिणीला जवळ घेतले… वैद्यकीय उपचारांनंतर या सर्वांना घरी सोडण्यात आले… Austin Applbee हा तेरा वर्षांचा पोरगा… not today… not today… not today म्हणत मृत्यूला हरवणारा पोरगा… हिरो ठरला आहे! जीवन अनमोल आहे… ते वाचवण्यासाठी ऐनवेळी शरीरही त्याच्या मर्यादा ओलांडून जाऊ शकते… फक्त जिद्द हवी… हेच यातून सिद्ध झाले.
(वरिष्ठ साहित्यकार श्री ओमप्रकाश पाण्डेय जीभारतीय स्टेट बैंक से 2015 में सहायक महाप्रबंधक के पद से सेवानिवृत्त. सन 2018 से कविताओं और लघु कथाओं का नियमित रूप से लेखन. दो काव्य संग्रह “ऑंचल” और “किलकारियाँ (बालगीत संग्रह)” तथा दो कथा संग्रह “चूड़ियाँ” और “अनपढ़” प्रकाशित. लगभग तीन सौ से अधिक कहानियाँ व लघु कथाएं रचित जिनमें “मार्निंग वाक” (दस कहानियाँ), “आधुनिक विक्रम और वेताल की कथा” (दस कहानियाँ), दीदी, प्रश्न या आमंत्रण, सोंच, विश्वास आदि चर्चित रहीं हैं. आपके द्वारा सात सौ से अधिक कविताएँ रचित जो कई साहित्यक मंचों पर प्रस्तुत की गईं हैं. आज प्रस्तुत है आपकी एक हृदयस्पर्शी एवं विचारणीय कथा “आखिर सुनती क्यों नहीं ?“.)
☆ कथा कहानी ☆ आखिर सुनती क्यों नहीं ? ☆ श्री ओमप्रकाश पाण्डेय ☆
अरे यार इतनी देर हो गई है, मैं मार्निंग वाक करके वापस भी चला आया और तुम अभी तक सो ही रही हो. उठो, मैं तब तक चाय बनाता हूँ. मैं जानता हूँ कि तुम्हें मेरे हाथ की चाय अच्छी नहीं लगती, लेकिन भाई मुझे तो पीना है. मैं बना रहा हूँ, अभी मेरे हाथ का चाय पी लो, फिर उठना तो बनाना, फिर तुम्हारा बनाया भी पी लेंगे. अरे अभी तक तुम फ्रेस नहीं हुई. मैं तो ज्यादा इंतजार नहीं कर सकता, चाय ठंडी हो जायेगी, तो मजा़ नहीं आयेगा, मैं तो चाय पी लेता हूँ.
वह भी क्या दिन थे, हम दोनों सुबह – सुबह टहलने जाते, और टहलने के बाद वहीं मैदान के बगल में एक अन्ना की इडली डोसा की दुकान थी, वहीं इडली खाते थे और वहीं पर काफी पीते थे. तुम्हें उसकी काफी बहुत पसंद थी. बहुत दिन हो गया, हम उधर गयेे नहीं. कोई कह रहा था कि अन्ना ने एक बहुत बड़ा साउथ इंडियन रेस्टोरेंट खोल लिया है और वहाँ केले के पत्ते पर दक्षिण भारतीय ढंग से बड़ा अच्छा खाना मिलता है. एक काम करना, एक दिन तुम दोपहर में खाना मत बनाना, हम दोपहर का खाना वहीं खायेंगे. बहुत दिन हो गया दक्षिण भारतीय खाना खाये हुए. उस साल हम लोग बच्चों के साथ मदुरै गये थे, मीनाक्षी मंन्दिर में, मीनाक्षी देवी के दर्शन करने के बाद, वहीं बगल के होटल में हम सबों ने खाना खाया था. कितना अच्छा खाना था! तुम्हें इतना अच्छा लगा कि दक्षिण भारत के दस दिनों की यात्रा में हम दोनों समय दक्षिण भारतीय खाना ही खाते रहे.
ठीक है चलो जाड़े में एक बार फिर दक्षिण भारत घूमने की योजना बनाते हैं. अब नौकरी से भी रिटायर हो चुका हूँ, छुट्टी की भी कोई चिंता नहीं, और बच्चे भी अपनी- अपनी जगह लग गये हैं, जितना दिन तुम्हारा मन होगा, हम घूमेंगे. देखो तुम अभी तक नहीं उठी! अरे यार रिटायर मैं हुआ हूँ, तुम नहीं. लगता जैसे तुम्हीं रिटायर हुई हो. जब नौकरी करता था तो कैसे मेरे उठने के पहले ही मेरा और बच्चों का नाश्ता और टिफिन बना कर तैयार कर देती थी और आश्चर्य तो यह कि तुम भी सुबह- सुबह ही तैयार हो जाती थी और मेरे साथ ही सुबह की चाय पीती थी. पूछने पर कहती थी कि सबके जाने के बाद अकेले के लिए एक कप चाय बनाने का मन नहीं करता. दोपहर में जब बर्तन माजने वाली आती है तो उसी से बनवा कर, उसके साथ दुबारा चाय पी लेती हूँ. लेकिन तुम खाना पहले भी बहुत देर से खाती थी. अरे अब तो जल्दी खाया करो, तुम्हारे चक्कर में आजकल मुझे भी देर हो जाती है. लेकिन तुम भी क्या करोगी, जिन्दगी भर का आदत कहाँ छूटता है! खैर चलो, कौन जल्दी है! लेकिन तुम आजकल सोने बहुत लगी हो.
इतने में दरवाजे की घंटी बजती है. अरे जरा देखो कौन घंटी बजा रहा है, शायद कचरा वाला होगा, रात में कचरे का डब्बा बाहर नहीं रखा था क्या? दुबारा घंटी बजने पर राघव बाबू दरवाजा खोलते हैं. सामने बेटी शीला खड़ी थी. शीला जैसे ही अन्दर आयी देखी कि टेबल पर एक कप चाय बिना पिये रखा है. बोली पापा कौन आया है? और अभी तक उसने चाय क्यों नहीं पिया, चाय ठंडी हो गई है. राघव बाबू ने कहा अरे तुम्हारी मम्मी के लिए बनाया था, अभी तक उठी नहीं! कोई बात नहीं, उठने पर दूसरा कप बना देंगे. तुम कैसी हो, दामाद जी कैसे हैं, मेरा छोटका नाती कैसा है?
शीला स्तब्ध खड़ी थी, उसके ऑंखों से ऑंसू बह रहे थे. राघव बाबू ने देखा. चौंक गए! बोले बेटी क्यों रो रही हो? ससुराल में सब लोग ठीक तो हैं? शीला ने राघव बाबू को सीने से लगा लिया और बच्चे की तरह रोने लगी. राघव बाबू कुछ समझ नहीं पा रहे थे. वहीं से बोले अरे देखो शीला बेटी आयी है. थोड़ी देर बाद शीला बोली पापा आप कब स्वीकार करेंगे कि मम्मी अब नहीं है, वर्षों पहले हम लोगों को छोड़ कर वह भगवान के यहाँ चली गई. थोड़ी देर तक दोनों बाप – बेटी एक दूसरे के ऑंखों से ऑंसू पोछते रहे.