मराठी साहित्य – विविधा ☆ महावस्त्राचे पदर – भाग ३ ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्री विश्वास देशपांडे

? विविधा ?

महावस्त्राचे पदर – भाग ३ ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

उगवतीचे रंग- नात्यांचं महावस्त्र

महावस्त्राचे पदर – भाग तीन : ‘बाबा’ (सह्याद्रीची ढाल)

​आतापर्यंत नात्याच्या महावस्त्राचे दोन भाग आपण पाहिले. त्यातील पहिला आणि अत्यंत महत्त्वाचा पदर होता ‘आई’. तिचा आपण ‘मायेची पैठणी’ म्हणून गौरवपूर्ण उल्लेख केला. आज या महावस्त्राचा दुसरा प्रमुख पदर पाहूया. हा पदर आहेत ‘बाबा’—घरातील आईनंतरचं दुसरं अत्यंत आदराचं दैवत!

​नात्यांचं महावस्त्र विणताना जसा एक धागा मायेच्या मुलायम आणि जरतारी रेशमाचा असतो, तसाच दुसरा अत्यंत महत्त्वाचा धागा हा त्या वस्त्राला बळकटपणा देणाऱ्या टणक सुताचा असतो. हे सुताचं बळकट आणि तितकंच सुरक्षित कोंदण म्हणजेच ‘बाबा’! आई जर या वस्त्राची देखणी सुवर्णमयी पैठणी असेल, तर बाबा या महावस्त्राला कवेत घेणारे आणि उन्हापावसापासून रक्षण करणारे आकाशाएवढे भक्कम छत्र असतात. कुटुंबासाठी ते स्वतः ‘सह्याद्रीची ढाल’ होतात.

​बाबा म्हणजे घराच्या या सुंदर इमारतीचा पायाचा भक्कम दगड असतात. पायाचा दगड जमिनीखाली गाडला गेलेला असतो, तो वरून कोणाला दिसत नाही आणि याची कोणी जाहीर स्तुतीही करत नाही; पण त्यावरच अख्ख्या घराचा डोलारा वर्षानुवर्षे सुरक्षित उभा असतो. कुटुंबाची जबाबदारी, मुलांचे शिक्षण, त्यांचे हट्ट आणि भविष्याची चिंता वाहत बाबा अहोरात्र झिजत असतात. स्वतःचे कपडे जुने झालेले असले, पादत्राणे झिजलेली असली, तरी मुलांच्या आनंदासाठी खिशातला शेवटचा रुपया आनंदाने रिकामा करताना कधीच बाबांच्या कपाळावर आठी उमटत नाही. मुलाला यश मिळालं की आई त्याला उराशी धरून रडते, पण बाबा मात्र घराच्या एखाद्या कोपऱ्यात किंवा गच्चीवर जाऊन शांतपणे आनंदाश्रू पुसतात. जगासमोर ते नेहमी कणखरच राहतात, कारण त्यांना माहिती असतं की घरातील हा मुख्य कणा जर मोडला, तर अख्खं घर कोलमडून पडेल!

​’देणाऱ्याने देत जावे’ या अतिशय प्रसिद्ध कवितेत कविवर्य विंदा करंदीकर म्हणतात:

​हिरव्या पिवळ्या माळाकडून हिरवी पिवळी शाल घ्यावी,

सह्याद्रीच्या कड्याकडून छातीसाठी ढाल घ्यावी.

​या ओळींमध्ये थोडासा भावबदल करून मी असं म्हणेन:

​प्रेम देणाऱ्या आईकडून मायेची उबदार शाल घ्यावी,

घराचे आभाळ पेलणाऱ्या बाबांकडून सह्याद्रीची ढाल घ्यावी!

​आपल्याकडे आईची महती सर्वांनीच गायिली आहे, पण त्या मानाने बाबा हे नाते थोडे दुर्लक्षितच राहिले आहे. आजच्या गतिमान युगात कोणी कोणाला क्वचितच पत्र लिहितो. परंतु पूर्वी जेव्हा एकमेकांच्या भावना किंवा सुखदुःखे जाणून घेण्यासाठी पत्राशिवाय दुसरं माध्यम नव्हतं, तेव्हा बाहेरगावी असणारा मुलगा वडिलांना पत्र लिहिताना पत्राची सुरुवात ‘तीर्थरूप’ या शब्दाने करायचा. आपली संस्कृती वडिलांना केवढं सर्वोच्च स्थान देत होती, हेच यातून सिद्ध होतं. वडील हे ‘तीर्थरूप’ म्हणजे तीर्थासारखे पवित्र! त्यांचं छत्र जोपर्यंत शिरावर आहे, तोपर्यंत अन्य कोणत्याही तीर्थक्षेत्री जाण्याची गरजच उरत नाही. ‘आईबाप हे दैवत माझे असता माझ्या घरी, कशाला जाऊ मी पंढरपुरी’ या सुंदर भावगीतात नेमका हाच विचार सांगितला आहे. आपल्याकडे केवळ एक दिवस ‘फादर्स डे’ साजरा करण्याची पद्धत नाही; आपली संस्कृती तर रोजच आई-वडिलांना आणि गुरूंना वंदन करायला शिकवते. “मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्यदेवो भव” हाच आपल्या जगण्याचा पाया आहे.

​आईची कोमलता, प्रेम, माया आणि हळुवारपणा या गुणांच्या पार्श्वभूमीवर बाबांचे थोडेसे विरोधी वाटणारे व्यक्तिमत्व अधिक उठून दिसते. रामगणेश गडकरी ऊर्फ गोविंदाग्रज आपल्या कवितेत महाराष्ट्राचे वर्णन करताना म्हणतात:

 ​राकट देशा, कणखर देशा, दगडांच्याही देशा,

 नाजूक देशा, कोमल देशा, फुलांच्याही देशा!

​जसा हा महाराष्ट्र वरून राकट आणि कणखर असला, तरीातून नाजूक, कोमल आणि फुलांचा प्रदेश आहे; मला वाटतं बाबांचे व्यक्तिमत्त्वही हुबेहूब असंच असतं! ते वरून राकट आणि कणखर दिसतात, पण ते केवळ बाह्य रूप असतं. मनाने बाबा सुद्धा तितकेच हळवे असतात. आईचे अश्रू सहज दिसतात, बाबांचे दिसत नाहीत; एवढाच काय तो फरक! बाबा म्हणजे अगदी ‘नारळासारखे’. नारळ वरून पाहायला किती कठिण, खडबडीत आणि टणक असतो; पण त्याच्या आत डोकावून पाहिलं, तर तिथे मायेचं गोड पाणी आणि शुभ्र खोबरे साठलेलं असतं. भगवान शंकरांनी जगाला वाचवण्यासाठी हलाहल विष कंठात धारण केलं, पण बाबांनी प्रपंचात येणाऱ्या समस्यांचं आणि संकटांचं हलाहल चक्क स्वतः पिऊन टाकलं! त्या आगीची झळ त्यांनी कधीच आपल्या लेकरांना लागू दिली नाही. मुलीच्या पाठवणीच्या वेळी जगासमोर खंबीर राहणारा, पण पाठीमागे कोपऱ्यात जाऊन मुसमुसून डोळे पुसणारा पिता मी स्वतः अनुभवला आहे.

​वडिलांच्या स्वभावातील काही वेळा जाणवणारी कठोरता आणि शिस्त ही केवळ आणि केवळ आपल्या मुलांच्या उज्वल हितासाठीच असते. आई जर मुलाचा पहिला गुरू असेल, तर वडील मुलाला मोठे होईपर्यंत आणि जगाच्या बाजारात पाय रोवून उभे राहेपर्यंत मार्ग दाखवणारे खरे मार्गदर्शक असतात. जेव्हा लहान असलेला मुलगा आईचं बोट सोडून चालण्याइतका मोठा होतो, तेव्हा त्याला पुढचा खडतर मार्ग बाबांच्याच मार्गदर्शनाने दिसू लागतो. पावलापावलावर ते त्याची सोबत करतात. “भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे” अशी त्यांची मूक भूमिका मुलाला आश्वस्त करणारी आणि त्याचा आत्मविश्वास वाढवणारी असते. अपयशाच्या काळात पाठीवर मायेचा हात ठेवून ‘लढ’ म्हणणारे बाबाच असतात.

​’आमचा बाप आणि आम्ही’ या पुस्तकात डॉ. नरेंद्र जाधव यांचे अशिक्षित वडील त्यांना जे मोलाचे मार्गदर्शन करतात, ते प्रत्येकाला अंतर्मुख करणारे आहे. ते म्हणतात, “तू काय बी कर, काय बी शिक; पण जे काय करशील त्याच्यात टॉपला जा! ” गायनाच्या क्षेत्रातील इतिहास ज्यांच्या नावाशिवाय कधीच पुढे जाऊ शकत नाही, अशा मंगेशकर भावंडांना आणि विशेषतः गानकोकिळा लता मंगेशकरांना स्वरांचे बाळकडू देऊन घडवणारे त्यांचे वडील मास्टर दीनानाथच होते!

​साहित्याच्या आणि सिनेमाच्या पडद्यावरही या नात्याची अथांगता नेहमीच अधोरेखित झाली आहे. ‘ शोले ‘ चित्रपटात जेव्हा तरुण मुलगा अकाली मृत्यू पावतो आणि तिथे त्याचे वृद्ध, अंध वडील (अभिनेते ए. के. हंगल) येतात, तेव्हाचा तो प्रसंग आणि त्यांचा संवाद काळीज चिरून टाकणारा आहे. ते अत्यंत कातर स्वरात म्हणतात—”जानते हो दुनिया का सबसे बडा दुःख क्या होता हैं? बाप के कंधे पर बेटे का जनाजा. ” काळीज विदीर्ण करून टाकणारे हे शब्द आहेत!

​’कुंवारा बाप’ चित्रपटात आपल्याला सापडलेल्या एका अनाथ मुलाला जीवापाड जपणारा मेहमूद आठवा….. त्या मुलाला पोलिओच्या आजारातून वाचवण्यासाठी तो जे रक्ताचं पाणी करतो, त्याचं वर्णन कोणत्या शब्दात करावं? तो प्रसंग पाहताना नकळत आपल्या डोळ्यातून पाणी आल्याशिवाय राहत नाही. अगदी त्रेतायुगात डोकावले, तर कैकयीला दिलेल्या वचनामुळे प्रभू रामाला जेव्हा वनवासात जावे लागते, तेव्हा पिता असलेल्या दशरथ राजाचा शोक हृदय पिळवटून टाकणारा आहे. हा कर्तव्यनिष्ठ पिता शेवटी केवळ पुत्रशोकातच आपले प्राण सोडतो.

​गीत रामायणात श्रीराम आणि लव-कुश यांच्या भेटीचा प्रसंग अत्यंत अद्भुत रीतीने वर्णन केला आहे. ‘कुश लव रामायण गाती’ हे गीत ऐकलं की डोळे भरून येतात. प्रभू श्रीरामांसमोर त्याचेच अपत्य त्याचे चरित्र गात असताना, गदिमांनी (ग. दि. माडगूळकर) शब्दांचा केवढा सुंदर चमत्कार साधला आहे:

“पुत्र सांगती चरित पित्याचे, ज्योतीने तेजाची आरती! “

​आणि तेवढ्याच ताकदीने बाबूजींनी (सुधीर फडके) ते आपल्या सुरांनी अजरामर केले आहे. या शब्दांचा प्रत्यक्ष प्रभू रामावर काय परिणाम होतो? तर गदिमा पुढे लिहितात:

​सोडुनि आसन उठले राघव, उठुनि कवळिती अपुले शैशव

पुत्रभेटीचा घडे महोत्सव, परी जो उभया नच माहिती!

​पिता-पुत्रांच्या या भेटीला गदिमांनी ‘पुत्रभेटीचा महोत्सव’ असे अतिशय सुंदर शब्द वापरले आहेत. खरोखरच दिव्य आणि अलौकिक प्रतिभा! ज्या रामाच्या पराक्रमाला पाहून कळिकाळही थरारतो, असे कर्तव्यकठोर श्रीराम आपल्या राजासनावरून उठून चक्क त्या लहान बालकांना प्रेमाने उराशी धरतात; कारण त्यांच्यातही असतं पित्याचं प्रेमळ हृदय!  

​इतिहासाच्या पानापानांत डोकावून पाहिले, तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जडणघडणीत माता जिजाऊंचे संस्कार जसे अनन्यसाधारण होते, तसेच वडील शहाजीराजांचे शौर्य, युद्धकौशल्य आणि ‘स्वराज्य’ स्थापनेची मूळ प्रेरणा ही वडिलांचीच देणगी होती. शहाजीराजांनी शिवरायांच्या पाठीवर ठेवलेला तो अदृश्य विश्वासाचा हातच होता, ज्याने एका नव्या युगाची पहाट निर्माण केली. कोणीतरी खूप सुंदर म्हटलं आहे:

​”आईकडे बोट धरून जगामध्ये कसं चालायचं हे शिकायचं असतं, पण रस्ता संपल्यावर पुढे स्वतःच्या पायावर कसं उभं राहायचं, हे फक्त बाबांनीच शिकवलेलं असतं. “

​जीवनात संघर्ष करण्याची ताकद आणि वागताना हवा असणारा विवेक हा मुलाला वडिलांच्या प्रेरणेतूनच मिळत असतो.

​पण आज एकविसाव्या शतकाच्या उत्तरार्धात, वर्तमान परिस्थितीने बाबा या नात्यासमोरही अनेक नवी आव्हाने उभी केली आहेत. पूर्वीच्या काळी वडिलांचा घरात एक वेगळा ‘दरारा’ असायचा. बाबा घरात आले की मुले शांत व्हायची, एका कोपऱ्यात जाऊन अभ्यासाला बसायची. तो काळ वेगळा होता आणि त्या काळाची शिस्त वेगळी होती. आज मात्र काळ बदलला आहे. आजचे बाबा हे केवळ शिस्त लावणारे ‘वडील’ उरलेले नाहीत, तर ते मुलांचे ‘सखे’ आणि ‘मित्र’ झाले आहेत. आजचा बाबा मुलांशी खेळतो, त्यांच्याशी मैत्री करतो, त्यांच्या मनातले समजून घेतो; बाबांचे हे बदललेले रूप अत्यंत सुखद आणि स्वागतार्ह आहे.

​परंतु, या आधुनिक आणि धावपळीच्या युगात ‘करिअर’ आणि ‘पैशांच्या’ शर्यतीमुळे बाबांना कुटुंबासाठी हवा तेवढा वेळ देणे जिकिरीचे झाले आहे. अहोरात्र काम केल्यामुळे मुलांशी असणारा प्रत्यक्ष संवाद बऱ्याचदा मागे पडतो. आपण मुलांना महागड्या वस्तू, गॅजेट्स किंवा चांगल्या शाळेत प्रवेश घेऊन देतो; पण त्यांना पैशांपेक्षा बाबांच्या ‘वेळेची’ आणि त्यांच्या ‘स्पर्शाची’ जास्त गरज असते, हे आजच्या पित्याला समजून घ्यावे लागेल. केवळ आर्थिक गरजा पूर्ण करणे म्हणजे पितृत्व नव्हे, तर मुलांच्या भावविश्वात प्रत्यक्ष उपस्थित राहणे, त्यांना नैतिक मूल्यांची जोड देणे ही आजची मोठी गरज आहे.

​ज्याप्रमाणे आई सुसंस्कारित असेल तर घर घडतं, तसेच बाबांचे घराकडे असणारे लक्ष, त्यांची संयमी वृत्ती आणि त्यांनी घेतलेले योग्य निर्णय यावर कुटुंबाचे संपूर्ण आरोग्य अवलंबून असते. नात्यांच्या या भरजरी ‘महावस्त्रा’चा हा पितृत्वाचा पदर जर बळकट आणि सुरक्षित राहिला, तरच येणारी पिढी कोणत्याही संकटाचा सामना खंबीरपणे करू शकेल. बाबा नावाच्या या आकाशाएवढ्या छत्राची सावली जपणे आणि त्यांच्या त्यागाची कृतज्ञतेने जाणीव ठेवणे, हीच खऱ्या अर्थाने या महावस्त्राची वीण घट्ट करणे आहे.

​थकलेल्या आणि वयस्कर झालेल्या बाबांसाठी ‘वृद्धाश्रम’ ही जागा म्हणजे शेवटचा पर्याय आहे असं मला वाटतं. घरातच त्यांना सर्वोच्च सन्मानाचे स्थान हवे. ‘नटसम्राट’ नाटक आपण सर्वांनीच पाहिले असेल; त्यातील गणपतराव उर्फ अप्पा बेलवलकर यांना आणि त्यांच्या पत्नीला वृद्धापकाळी मुलं सांभाळायला तयार होत नाहीत, तेव्हा त्यांची होणारी घालमेल काळीज हेलावून टाकते. अमिताभ बच्चन आणि हेमा मालिनी यांचा ‘बागबान’ चित्रपटही याच विदारक वास्तवावर भाष्य करतो. अशी नाटकं किंवा चित्रपट पाहताना डोळ्यातून अश्रू ओघळल्याशिवाय राहत नाहीत. कोणीतरी फार सुंदर म्हटले आहे:

​”या वाळलेल्या पानांवर नेहमी जपून पाय ठेवा….. कारण, एकेकाळी याच पानांनी तुम्हाला रखरखत्या उन्हात मायेची सावली दिली होती! “

​आज त्या पानांना आपल्या प्रेमाच्या आणि आदराच्या सावलीची नितांत गरज आहे, हे आपण विसरता कामा नये.

© श्री विश्वास देशपांडे

३/७/२०२६

चाळीसगाव

प्रतिक्रियेसाठी – ९४०३७४९९३२

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ त्याग ☆ प्रस्तुती – श्री मेघ:श्याम सोनावणे ☆

श्री मेघ:श्याम सोनावणे

🌸 जीवनरंग 🌸

☆ त्याग… लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री मेघ:श्याम सोनावणे ☆

माझं नाव विवेक शर्मा आहे. मी ३२ वर्षांचा आहे. जेव्हा लोक मला विचारतात की मी काय करतो, तेव्हा मी सांगतो की मी किराणा दुकान चालवतो. ते हसतात, कारण त्यांना माहीत आहे की मी आयआयटी मुंबईमधून कॉम्प्युटर सायन्समध्ये सुवर्णपदक विजेता आहे, आणि माझ्या कपाटात अजूनही सॅन फ्रान्सिस्कोमधील एका कंपनीचं ऑफर लेटर आहे, ज्यात वर्षाला २, ४०, ००० डॉलर्स पगाराचा उल्लेख आहे. मी ते पत्र कधीच फाडलं नाही, पण त्याचा वापरही कधी केला नाही.

ही गोष्ट १९९८ साली, कानपूरच्या किडवाई नगरमध्ये सुरू होते. दोन खोल्यांचं घर, ज्याच्या वरच्या मजल्यावर पत्र्याचं छप्पर होतं. माझे वडील रेल्वेत कारकून होते आणि माझी आई शिकवणी घ्यायची. मी एकुलता एक मुलगा होतो. माझ्या वडिलांचा पगार ८, ००० रुपये होता. माझ्या आईची शिकवणीचं उत्पन्न २, ००० रुपये होती. आम्ही मध्यमवर्गीयही नव्हतो, तर निम्न मध्यमवर्गीय होतो.

पण माझ्या वडिलांचं एक स्वप्न होतं: की त्यांच्या मुलाने एक महान माणूस बनावं. त्यांनी मला कधीच डॉक्टर किंवा इंजिनिअर व्हायला सांगितलं नाही. ते सहजच म्हणाले, “बाळा, तुला हवं तितकं शिक; पैशांची चिंता करू नकोस. “

मी शिकत राहिलो. मला दहावीत ९५% आणि बारावीत ९७% मिळाले. कोचिंगची फी १ लाख होती. माझ्या वडिलांनी त्यांचा पीएफ काढला. माझ्या आईने तिच्या बांगड्या विकल्या. मी कोटाला गेलो. मी दोन वर्षे पंख्याखाली बसून, डासांकडून चावून घेत अभ्यास केला. २०१२ मध्ये निकाल लागला, अखिल भारतीय रँक (AIR) १४७. आयआयटी मुंबई, कॉम्प्युटर सायन्स.

ज्या दिवशी पत्र आले, त्या दिवशी माझ्या वडिलांनी मिठाईचा बॉक्स आणला आणि तो संपूर्ण परिसरात वाटला. माझी आई रडली. ती म्हणाली, “आता माझा मुलगा अमेरिकेला जाईल. “

मी आयआयटीमध्ये यशस्वी झालो. कोडिंग, हॅकेथॉन, इंटर्नशिप. तिसऱ्या वर्षी गुगलमध्ये समर इंटर्न, १ लाख स्टायपेंडसह. माझ्या पहिल्या पगारातून मी वडिलांना फोन आणि आईला वॉशिंग मशीन घेऊन दिली. माझे वडील फोनवर म्हणाले, “बाळा, आता मी निवृत्तीनंतर आराम करेन. “

माझ्या शेवटच्या वर्षात प्लेसमेंट. मी रात्रंदिवस तयारी केली. डिसेंबर २०१५ मध्ये, सॅन फ्रान्सिस्कोस्थित, स्ट्राइपसारख्या एका पेमेंट स्टार्टअप कंपनीने माझी मुलाखत घेतली. चार फेऱ्या झाल्या. शेवटच्या फेरीत, सीटीओ (CTO) म्हणाले, “आम्हाला तूच हवा आहेस. ” ऑफर आली: $२४०, ०००, H1B व्हिसा, स्थलांतराची सोय.

मी हॉस्टेलमधील माझ्या मित्रांना हे आनंदातिरेकाने ओरडून सांगितले. त्या रात्री मी माझ्या वडिलांना फोन केला. वडील शांत राहिले, मग म्हणाले, “बाळा, ही खूप मोठी गोष्ट आहे. ” आई म्हणाली, “तुझा पासपोर्ट बनवून घे. “

मी ऑगस्ट २०१६ मध्ये रुजू होण्यासाठी तिकिटांच्या उपलब्धतेचा शोध सुरू केला.

मार्च २०१६ मध्ये मी होळीसाठी घरी आलो. वडील अशक्त दिसत होते. त्यांना खोकला येत होता. मी म्हणालो, “डॉक्टरला दाखवा. ” ते म्हणाले, “काही नाही, फक्त सर्दी आहे.” आईसुद्धा थकलेली होती. मला वाटले हे फक्त म्हातारपणामुळे असेल.

एप्रिलमध्ये मला आईचा फोन आला. वडील चक्कर येऊन पडले होते आणि हॉस्पिटलमध्ये होते. मी तिथे धावत गेलो. डॉक्टर म्हणाले, “फुफ्फुसांचा संसर्ग आणि हृदयाचा त्रास आहे. अँजिओप्लास्टी करावी लागेल. ” खर्च ३ लाख रुपये होता.

माझ्या वडिलांचा वैद्यकीय विमा होता, पण त्यात फक्त अर्धाच खर्च समाविष्ट होत होता. मी माझ्या इंटर्नशिपचे २ लाख रुपये काढले. ऑपरेशन झाले. वडील वाचले.

मी माझ्या अंतिम प्रकल्पासाठी मुंबईला परत गेलो. मे महिन्यात, मी पुन्हा फोन केला. आईला अधूनमधून चक्कर येऊ लागली होती. तिला स्तनाच्या कर्करोगाच्या दुसऱ्या टप्प्याचे निदान झाले. डॉक्टर म्हणाले, केमो सुरू करावे लागेल, सहा वेळा, प्रत्येक वेळेचा खर्च ८०, ००० रुपये. एकूण ५, ००, ००० रुपये, आणि नंतर शस्त्रक्रिया करावी लागेल.

मला धक्काच बसला. माझे वडील सेवानिवृत्त होते, त्यांना १२, ००० रुपयांचे निवृत्तीवेतन मिळत होते. घरातली सगळी बचत संपली होती. मी मित्रांकडून उसने पैसे घेतले आणि १, ००, ००० रुपये मिळवले. बाकीचे पैसे?

जून महिन्यात, मी घरी बसलो होते, हातात ऑफर लेटर होते. व्हिसाची मुलाखत १५ जुलैला होती. विमानप्रवास १० ऑगस्टला होता. माझ्या आईची पहिली केमो २० जूनला होती.

मी माझ्या वडिलांना म्हणालो, मी कर्ज घेईन. माझे वडील म्हणाले, “कोण फेडणार? मला घर गहाण ठेवावं लागेल. ” मी म्हणालो, “मी ठेवीन. ” माझे वडील म्हणाले, “हे घर तुझ्या आईचं आवडतं आहे. “

त्या रात्री, मी छतावर बसलो होतो. आकाशात एक विमान उडत होतं. मला वाटलं, “हे विमान मला घेऊन जाईल. ” त्याचवेळी, माझी आई खाली वेदनेने विव्हळत होती.

मी माझ्या मार्गदर्शकाला ईमेल केला, “मी रुजू होणं सहा महिन्यांसाठी पुढे ढकलू शकतो का? ” उत्तर आलं, “सॉरी विवेक, आम्हाला आत्ता लोकांची गरज आहे. हवंतर तुम्ही पुढच्या वर्षी पुन्हा अर्ज करू शकता. “

मी पुन्हा ईमेल केला, “आताच येण्याचा प्रयत्न करतो. “

१४ जुलैची रात्र. उद्या व्हिसाची मुलाखत. परवा आईची दुसरी केमो. वडील औषध आणायला गेले होते. जेव्हा ते परत आले, तेव्हा औषधाची चिठ्ठी खाली पडली आणि त्यांना ती उचलायला वाकता येत नव्हतं. मी ती उचलली. तेव्हा मला जाणवलं, जर मी निघून गेलो, तर हे दोघे कसे जगतील? बाबा सेवानिवृत्त आणि आजारी आहेत. आईची केमोथेरपी चालू आहे. भावंडं नाहीत. मदतीला कोणी नातेवाईक नाहीत. तिला हॉस्पिटलमध्ये कोण घेऊन जाईल, तिची औषधं कोण आणेल, रात्री तिला पाणी कोण देईल?

मी सकाळी व्हिसाची मुलाखत रद्द केली. कंपनीला ईमेल केला, “ऑफरबद्दल धन्यवाद. कौटुंबिक वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीमुळे, मी रुजू होऊ शकत नाही. “

मित्रांनी फोन केला, “तू वेडा झाला आहेस का? तू १ कोटी ६० लाख रुपयांची नोकरी सोडत आहेस. ” 

मी म्हणालो, “हो. “

मी आईला हे सर्व सांगितलं नाही. मी बाबांना सांगितलं. ते गप्प राहिले, मग म्हणाले, “बाळा, तुझं करिअर. ” मी म्हणालो, “मी माझं करिअर पुन्हा उभं करेल, पण जर आत्ता गेलो तर तुम्ही पुन्हा मला दिसणार नाहीत. “

मला कानपूरमध्ये नोकरी मिळाली. एका स्थानिक सॉफ्टवेअर कंपनीत, पगार ३५, ०००. मी रुजू झालो. सकाळी ९ ते संध्याकाळी ६ ऑफिस, संध्याकाळी हॉस्पिटलमध्ये. केमोथेरपी दरम्यान आईचे केस गळाले आणि ती रडली. मी तिच्यासाठी एक विग विकत घेतला. मी बाबांना त्यांची औषधं वेळेवर दिली. २०१६ ते २०१८, अशी दोन वर्षे निघून गेली. आईची शस्त्रक्रिया झाली आणि ती बरी झाली. कॅन्सर नियंत्रणात आला. बाबांची तब्येत स्थिर झाली. पण पैसे संपले. माझ्यावर ७ लाख रुपयांचे कर्ज झाले होते.

२०१८ मध्ये कंपनी बंद झाली. मी बेरोजगार झालो. मी इतर ठिकाणी मुलाखती दिल्या आणि बंगळूरुहून १८ लाख रुपयांची नोकरीची ऑफर आली. पण मी नकार दिला. माझे वडील म्हणाले, “जा, बाळा. ” मी म्हणालो, “मी आता जाऊ शकत नाही. माझ्या आईला दर तीन महिन्यांनी तपासणीची गरज असते, तुम्हाला मधुमेह आहे. तुमची काळजी कोण घेणार? “

माझे मित्र म्हणाले, “तू तुझं करिअर खराब करत आहेस. ” मी म्हणालो, “हे करिअर माझं आहे आणि आई-वडीलही माझेच आहेत. “

मी माझ्या घराखाली, वडिलांच्या नावाने ‘शर्मा जनरल स्टोअर’ नावाचं एक छोटं दुकान उघडलं. मी माझा कॉम्प्युटर तिथेच ठेवला आणि डाळी व तांदूळ विकायला सुरुवात केली. पहिल्या दिवशी मला लाज वाटली. मी एक आयआयटीयन होतो. मग एक काकू आल्या आणि म्हणाल्या, “बाळा, तुझ्या आईने मला शिकवलं आहे. तू दुकान उघड, आम्ही इथूनच खरेदी करू. “

हळूहळू दुकान भरभराटीला आलं. मी सकाळी ६ वाजता घाऊक बाजारात सामान आणायला जायचो, दिवसा खरेदी करायचो, रात्री फ्रीलान्स कोडिंग करायचो आणि ५०० डॉलर्समध्ये एक वेबसाइट बनवली.

२०१९ मध्ये, माझी आई पूर्णपणे बरी झाली होती. डॉक्टर म्हणाले, “सर्व काही ठीक आहे. ” त्या दिवशी, मी दुकान बंद करून मंदिरात गेलो. मी प्रसाद अर्पण केला. जेव्हा मी घरी आलो, तेव्हा माझे वडील म्हणाले, “बाळा, तू आमच्यासाठी सर्व काही सोडून दिलंस. ” मी म्हणालो, “मी सोडलेलं नाही, मी फक्त बदललं आहे. “

२०२० चा लॉकडाऊन. जीवनावश्यक वस्तूंची दुकाने उघडली. लोकांना किराणा सामानाची गरज होती. मी घरपोच डिलिव्हरी सुरू केली. मी सायकलवरून जाऊ लागलो. बाबा हिशोब सांभाळायचे. आई पॅकिंग करायची. त्या लॉकडाऊनमध्ये आम्ही २ लाख रुपये कमावले. मी कर्जाची अर्धी परतफेड केली.

२०२१ मध्ये, मी माझ्या दुकानाच्या बाजूलाच मुलांना कोडिंग शिकवण्यासाठी एक छोटा कॉम्प्युटर क्लास सुरू केला. त्याची फी महिन्याला ५०० रुपये होती. २० विद्यार्थी आले. मला पुन्हा माझं आवडतं कोडिंग करायला मजा येऊ लागली.

२०२२ मध्ये, अंश नावाच्या ए विद्यार्थ्याने, जो माझ्याकडे शिकला होता, राष्ट्रीय ऑलिम्पियाड जिंकले. बातमी आली, “कानपूरच्या एका आयआयटीयन किराणा दुकानदाराकडून शिकून  विजय मिळवला. ” तो लेख व्हायरल झाला.

त्याच आठवड्यात, मला स्ट्राइपच्या त्याच सीटीओकडून एक ईमेल आला. त्यांनी लिहिले होते, “विवेक, मी तुझी स्टोरी पाहिली. आम्ही भारतात ऑफिस उघडत आहोत. तुला रिमोट पद्धतीने, पार्ट-टाइम, एका शैक्षणिक उपक्रमाचे नेतृत्व करायला आवडेल का? “

मी हो म्हटले. आता मी सकाळी दुकानात, दुपारी क्लासमध्ये आणि संध्याकाळी यूएस टीमसोबत काम करतो. पगार डॉलर्समध्ये नाही, पण तो प्रचंड आहे.

गेल्या महिन्यात, माझ्या वडिलांनी वयाची ६८ वर्षे पूर्ण केली. मी एक छोटा कार्यक्रम आयोजित केला होता. तेच मित्र आले होते, जे म्हणायचे की वडिलांनी माझे करिअर खराब केले. माझे वडील माईक घेऊन म्हणाले, “माझा मुलगा अमेरिकेला गेला नाही, पण तो माझ्यासोबत राहिला. मी हॉस्पिटलमध्ये असताना त्याने माझा हात धरला होता. जेव्हा त्याच्या आईचे केस परत आले, तेव्हा त्याने तिच्या केसांच्या वेण्या घातल्या. बाळा, बरेच लोक करिअर घडवतात, पण त्यातले काही मोजकेच यशस्वी होतात.”

माझी आई हळू आवाजात म्हणाली, “मला ते ऑफर लेटर अजूनही आठवतंय. तू ते कपाटात का ठेवलंस? “

मी म्हटलं, “जेणेकरून मी काय मागे सोडलंय याची मला आठवण राहील. ” 

ती म्हणाली, “तू सोडलं नाहीस, तू निवड केलीस. “

आज मी दुकानात बसलो आहे. माझ्यासमोर शाळेची मुलं कँडी विकत घेत आहेत. माझ्या लॅपटॉपवर कोडिंग चालू आहे. बाबा माझ्या शेजारी वर्तमानपत्र वाचत आहेत आणि आई काउंटरवर बसली आहे.

कधीकधी रात्री, मी ते ऑफर लेटर बाहेर काढतो. २४०, ००० डॉलर्स. मग मला आईचं हसणं ऐकू येतं आणि बाबांचा खोकला थांबलेला असतो. समजलं. आणि मी ते पत्र परत ठेवून देतो.

लोक विचारतात, मला त्याचा पश्चात्ताप होतो का? मी खरं सांगतो, पूर्वी व्हायचा. जेव्हा मित्र बंगळूरुमधून, अमेरिकेच्या सहलींचे फोटो पोस्ट करायचे. आता तसं होत नाही. कारण मी माझ्या करिअरचा बळी दिला नाही, उलट मी त्याला एक नवीन ओळख दिली. माझं करिअर आता फक्त कोडिंग नाही, तर ती एक काळजी आहे.

मी माझ्या आई-वडिलांसाठी अमेरिका सोडली, पण त्यांच्यासोबत आयुष्य जगलो. मला रोज सकाळी माझ्या वडिलांना चहा द्यायला आणि माझ्या आईचे पाय दाबायला मिळतात. हे काही २. ४ कोटी रुपयांनी मिळत नाही.

जर मला पुन्हा संधी मिळाली, तर मी तेच करेन. माझा व्हिसा रद्द करेन, नोकरी सोडेन आणि एक दुकान उघडेन. कारण काही त्याग हे नुकसान नसतात; ती प्रेमातील गुंतवणूक असते.

आणि आज, जेव्हा एखादं मूल विचारतं, “दादा, आयआयटी पूर्ण केल्यावर दुकान का उघडलं? ” तेव्हा मी हसून म्हणतो, “कारण माझ्या आई-वडिलांची माझ्या आयुष्यातली सर्वात मोठी कंपनी आहे आणि मी त्यांचा पूर्णवेळ सीईओ आहे. ” 

**

लेखक : अज्ञात.

प्रस्तुती : श्री मेघ:श्याम सोनावणे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “माझी वारी ! माझा अनुभव !”- लेख क्र. २ ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

??

माझी वारी ! माझा अनुभव ! – लेख क्र. २ ☆ श्री संभाजी बबन गायके 

वारकरी भिकारी नव्हेत… भिकारी वारकरी नव्हेत!

होईन भिकारी । पंढरीचा वारकरी ॥१॥

हाचि माझा नेम धर्म । मुखी विठोबाचें नाम ॥ध्रु. ॥

हेचि माझी उपासना । लागेन संतांच्या चरणा ॥२॥

तुका म्हणे देवा । हेचि माझी भोळी सेवा ॥३॥

माझे निगडी प्राधिकरण येथील मित्रस्नेही जयंत गोपीनाथ नित्सुरे यांच्या घरी दर महिन्याच्या एका विशिष्ट तिथीला एक वृद्ध वारकरी रात्रीच्या मुक्कामास येत असत. बाहेरच्या खोलीतील कोप-यात त्यांचा प्लास्टिकचा कागद अंथरून बसत. एक वेळच्या भुकेला पुरेल एवढेच अन्न घेत. आणि अंगावर एक धोतर पांघरून निजून जात. अगदी पहाटे उठून थंड पाण्याने स्नान करून, धोतर वाळायला घालून नित्यनेमासाठी बसत. मुखाने हरीनाम घेत कपाळी गंध रेखीत. छोट्या लोखंडी पत्र्याच्या पेटीत त्यांचा सारा सरंजाम असे. केवळ एक कप चहा घेत आणि त्यांच्या मार्गाला निघून जात. कधी घरातल्या गोष्टींत लक्ष नाही की मध्ये बोलणे नाही. दूर कुठल्याशा गावातून येत असत. जयंत यांच्या वडिलांपासून या वारकरी बाबांचा हा नेम कित्येक वर्षे सुरु होता……. आणि एका महिन्याच्या त्या तिथीला बाबा आले नाहीत….. आणि पुढेही कधी आले नाहीत! मग त्यांनी सांगितलेली गोष्ट आठवली!

वारकरी वर्षातून चार वा-या करतात हे अनेकांना ठाऊक नसेल….. चैत्री, आषाढी, कार्तिकी आणि माघी! आणि काही वारकरी दर महिना! होय. दर महिना! देहू-आळंदी ते पंढरपूर चालत जायला बारा दिवस. पंढरीत दशमीला पोहोचून एकादशीचे दर्शन आणि द्वादशीला भल्या सकाळी बारस सोडून त्र्ययोदशीला आळंदीकडे प्रस्थान….. असा हा क्रम असे. अर्थात हा अवघड मार्ग अनुसरणारी मंडळी मोजकीच असतात, यात नवल नाही!

या नेमाच्या वारक-यांची अर्थातच एकमेकांशी ओळख असे. एखादे द्वादशीस त्या नेहमी येणा-या वारक-यांपैकी कुणी अनुपस्थित असेल, तर उरलेले वारकरी त्याचे चंद्रभागा तीरावर पिंडदान करीत…………. कारण तो वारकरी वारीस न येण्याचे एकमेव कारण असू शकते ते म्हणजे त्याचा मृत्यू! आणि ज्या अर्थी तो वारकरी वारीस आलेला नाही त्याअर्थी त्याचा मृत्यूच झालेला असला पाहिजे….. अन्य कोणतेही कारण त्याला वारीळा येण्यापासून रोखू शकत नाही, असा विश्वास असे. म्हणून त्याला श्रद्धांजली म्हणून त्याचे पिंडदान! हे अत्यंत अभावाने घडत असले, खरे वाटत नसले, अतिशयोक्तीचे वाटत असले तरी अशी वारकरी मंडळी या संप्रदायाने अनुभवलेली आहेत….. हे नाकारता यायचे नाही! वर उल्लेख केलेले वारकरी बाबा पुन्हा आले नाहीत याचा तोच अर्थ होता!

पूर्वी पायी प्रवास होई. कालांतराने झालेल्या सुविधा आणि वाढते वय यांमुळे काही वारकरी एस. टी. , रेल्वेनेही प्रवास करू लागले होते. याही काळात असे काही नेमाचे वारकरी निश्चित आहेत पण अर्थात संख्या कमी झालेली असेल, इतकंच!

काही लोकांनी संसारातून निवृत्त झाल्याने तर काहींनी त्यांच्या वैय्यक्तिक कारणांनी, धार्मिक श्रद्धेपोटी हा मार्ग स्वीकारलेला असू शकतो. काही जण घराण्याची परंपराही सुरु ठेवतात. असो.

पायी प्रवास, वाहनांचा प्रवास, वाटेतील अनुषंगिक खर्च यासाठी अनेक लोक स्वखुशीने या वारक-यांना आर्थिक साहाय्य करतात. आणि यांनीही केवळ गरजेपुरतेच अन्न, धन स्वीकारावे असे अपेक्षित असते. काही वारक-यांनी प्रत्येक गावातील विशिष्ट घरे नेमून घेतलेली असतात आणि हा क्रम वर्षानुवर्षे चालायचा पूर्वी. आता जमाना बदलला आहे!

वारकरी लोकांना जनता खुशीने दान देते याचा गैरफायदा घेणारेही पुढे निपजले. त्यामुळे कालांतराने वारकरी आणि भिकारी यांत फरक दिसेनासा झाला!

जगदगुरु संत श्री तुकोबारायांनी ‘होईन भिकारी’ हे अत्यंत वेगळ्या आणि अध्यात्मिक अर्थाने म्हटले आहे. अन्यथा त्यांच्या सारख्या मूळच्या श्रीमंतास असे लिहायची गरज पडली नसती.

हल्ली जवळजवळ सर्वच संतांच्या पालखी सोहळ्यासोबत चालणारा समाज संख्येने प्रचंड दिसून येतो. याची काही अध्यात्मिक कारणे असली तरीही सोहळ्यात केवळ पोटार्थी लोकांची, भिका-यांची संख्याही वाढलेली दिसते आहे. विशेषत: ज्ञानेश्वर महाराजांच्या श्रीमंत पालखी सोहळ्यासोबत शहरे जवळ आली की वारीत संख्या वाढते… त्यात काही टक्के भिकारी मंडळी असतात. कारण माऊलीच्या मार्गावर पुणे आणि अशीच काही सधन शहरे येतात. आणि येथील लोकही मोठ्या प्रमाणावर, अगदी चढाओढ लावून दान, अन्नदान करताना दिसतात. हाच सोहळा पुढे पुढे गेला की मधल्या मोकळ्या रस्त्यांवर वारीतील भिका-यांची संख्या रोडावते… कारण काही मिळण्याचे प्रमाण कमी होत असते. यामुळेच कुठे काही वाटप होत असेल तर ही भिकारी मंडळी खूप गोंधळ करतात, अधिकच्या वस्तू, अधिकचे अन्न पदरात पाडून घेण्याचा प्रयत्न करतात. आणि हे भिकारी चक्क वाहनांनी पुढील सधन गावांत जाऊन थांबतात!

वारीत सहभागी असलेल्या अधिकृत दिंड्या स्वयंपूर्ण असतात. संबंधित वारकरी आपसांत वर्गणी (ज्याला भिशी असं म्हणतात) जमा करतात, दानशूर लोकांकडून देणग्या, वस्तू मिळवतात आणि संपूर्ण खर्च भागवतात. बरीचशी कामे वारकरी कार्यकर्ते स्वत:च करीत असले तरी स्वयंपाक, वाहने आणि इतर काही व्यवस्थांसाठी मानधनावर लोक नेमावे लागतात. आणि हे लोकही केवळ पैशांसाठी नव्हे तर सेवा म्हणून हे कार्य स्वीकारताना दिसतात. स्वयंपाकासाठी लागाणारे सर्व साहित्य, पदार्थ वाहनांमध्ये सोबत घेत प्रवास सुरु असतो. वाटेतील दुपारच्या, रात्रीच्या भोजनासाठी प्रायोजक असतात… त्याला पंगत देणे असे संबोधले जाते!

पालखी रथामागे किंवा रथापुढे चालणा-या दिंड्यांना विशिष्ट क्रमांक दिलेले असतात. आणि ही शिस्त पाळावीच लागते. शेगावच्या संत गजानन महाराजांचा पालखी सोहळा तर अत्यंत कडक शिस्तीसाठी सुप्रसिद्ध आहे. यात वेशभूषा आणि नित्यनेमाला खूप कटाक्षाने महत्त्व दिले जाते. स्वयंपूर्ण दिंडीतील वारक-यांना इतर कुणाकडून अन्न किंवा वस्तू घेण्याची गरज रहात नाही. अर्थात खेडोपाड्यातून येणा-या काही साध्या, छोट्या दिंड्या, ज्यांना आर्थिक पाठबळ कमी असते, अशा दिंडीतील वारकरी काहीवेळा भाविकांनी देऊ केलेले अन्न, वस्तू स्वीकारतात. पण ही याचना नव्हे!

कित्येक गावातील भाविक मंडळी दिंड्यामधील वारक-यांना अगदी आग्रहाने घरी नेऊन जेऊ घालतात. विशेषत: तुकोबारायांच्या पालखी सोहळ्यात हे प्रमाण मोठे आहे.

पूर्वी तुकोबारायांचा सोहळा कमी संख्येचा असे. मार्गही खडतर असे. त्यामुळे सोहळ्यात भिका-यांची संख्याही कमी असे. आता परिस्थिती बदलली आहे!

पालखी सोहळ्यासोबत विविध व्यवसाय करणारे हजारो लोक चालत असतात. ही मंडळी सुद्धा वारीतील दानाचा बराच लाभ घेताना दिसतात. सामान्य लोकांना बरेचदा केवळ वारीसाठी भक्तीभावाने चालणारी माणसे आणि व्यवसायानिमित्त, काही हेतू मनात ठेवून चालणारी माणसं यांतील फरक समजू शकत नाही! याला काही इलाज नाही. शेवटी माऊली, महाराज आणि सर्वच संत मंडळी पालखी सोहळ्यात सहभागी असणा-या कुणालाही रिक्तहस्त ठेवीत नाहीत, अशी श्रद्धा आहेच!

देशभरातल्या विविध धार्मिक यात्रा, कुंभमेळे यांत व्यावसायिक भिकारी नित्यनेमाने हजेरी लावत असतात, हेही खरेच आहे. पंढरीची वारीही त्याला अपवाद नाही! पण खरे वारकरी भिकारी नसतात आणि भिकारी वारकरी नसतात….. हे या निमित्ताने नमूद करावेसे वाटते!

सोहाळ्यात कुणीही उपाशी राहत नाही… मराठी भाविक मने त्यांना त्यांना उपाशी राहू देत नाहीत… या सर्वांना सोबत घेऊन ज्ञानोबाराय, तुकोबाराय आणि इतर असंख्य संत दरवर्षी पंढरीची वाट चालत असतात… हा सुखसोहळा स्वर्गी नाही! रामकृष्णहरी!

– लेख क्र. २ 

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून  ☆ तारीख पे तारीख… ☆ तृप्ती देव ☆

तृप्ती देव

? मनमंजुषेतून ?

तारीख पे तारीख… ☆ तृप्ती देव

तारीख पे तारीख…

आणि माझं भविष्य वेटिंगवर!

मी धनु राशीची आहे… आणि माझी एक मोठी चूक झाली. चुका तर नेहमी होतात माझ्याकडून.

एकदा काय झालं, उत्सुकतेपोटी धनु राशीचं एक पॉडकास्ट पाहायला गेले! पण त्या एका व्हिडिओने माझ्या मोबाईलच्या अल्गोरिदमला बहुतेक वाटलं असेल की, “ही बाई आता ग्रह-ताऱ्यांच्या भरवशावरच जगणार!”

तेव्हापासून मोबाईल उघडला की धनु राशी, युट्युब उघडलं की धनु राशी, फेसबुक उघडलं की धनु राशी आणि रील्स स्क्रोल केल्या की धनु राशी! अगदी वाटतं, माझ्या मोबाईलमध्ये गुगल नाही, तर थेट एखादा ज्योतिषीच राहायला आलाय!

गेले काही दिवस मला एक नवीनचं छंद लागलाय… सकाळी चहा हातात आणि मोबाईलमध्ये पॉडकास्ट! आणि प्रत्येक पॉडकास्टमध्ये एकच मोठी घोषणा… “धनु राशीवाल्यांनो, तयार राहा! तुमच्या आयुष्यात मोठा बदल होणार आहे!” हे ऐकून मी पण अगदी उत्साहात मनात म्हटलं, “चला! अखेर ग्रहांना माझा पत्ता सापडला वाटतं!” 

पहिला ज्योतिषी म्हणाला, “१० तारखेपासून गुरूची कृपा सुरू होईल. ” मी १० तारखेपर्यंत कसातरी संयम ठेवला. १० तारीख आली… गुरू आला की नाही माहीत नाही, पण वीजबिल मात्र अगदी वेळेवर आलं!

मग दुसरा पॉडकास्ट समोर आला, तो म्हणाला— “२१ तारखेनंतर अडकलेले पैसे मिळतील. ” हे ऐकताच मी माझ्या देणेकऱ्यांचे नंबर पुन्हा व्यवस्थित सेव्ह केले. कोणी स्वतःहून पैसे देईल म्हणून मोबाईलकडे अगदी प्रेमाने पाहू लागले. २१ तारीख आली… पैसे काही आले नाहीत, उलट एका मैत्रिणीने मेसेज केला, “थोडे पैसे पाठवशील का? ” 

त्यानंतर आला तिसरा ज्योतिषी, तो म्हणाला— “या महिन्याच्या शेवटी तुमचं नाव होईल! ” मी मनात म्हटलं, “वा! आता पुरस्कार, मुलाखती, सत्कार सगळं काही! ” महिना संपला… नाव झालं खरं! पण शेजारच्या किराणा दुकानाच्या उधारीच्या वहीत सगळ्यात वर!

आता तर परिस्थिती अशी झाली आहे की, मी तारखांची वाट बघते आणि तारखा माझी मजा बघतात! ५ तारीख… १० तारीख… १५ तारीख… २१ तारीख… २८ तारीख… तारखा बदलतात, महिने बदलतात, व्हिडिओ बदलतात, ज्योतिषी बदलतात… पण माझं भविष्य मात्र सरकारी फाईलसारखं. पुढील आदेशापर्यंत प्रलंबित! ” 

खरं सांगायचं तर, या सगळ्या व्हिडिओंनी माझ्या मनात एक गोड लालसा आणि आशा निर्माण केली. मलाही माझे जुने अडकलेले पैसे परत हवे आहेत, मलाही माझं नाव कमवायचं आहे, माझ्या मनासारखं आयुष्य जगायचं आहे आणि मलाही एक दिवस अभिमानाने म्हणायचं आहे— “हो! आता माझा काळ बदललाय! “

आणि प्रत्येक पॉडकास्ट हेच स्वप्न पुन्हा पुन्हा रंगवतो— “बस ही तारीख… मग सगळं बदलेल! ” पण या सगळ्यातून आता मला एक मोलाची गोष्ट समजली आहे… गुरू ग्रह राशीत येण्यापेक्षा, आपण स्वतः कामाला लागणं जास्त महत्त्वाचं आहे. कारण ग्रहांचा प्रवेश कधी होईल माहीत नाही, पण प्रयत्नांचा प्रवेश रोज करता येतो!

तरीसुद्धा… उद्या जर एखादा नवीन पॉडकास्ट म्हणाला, “धनु राशीवाल्यांनो, उद्यापासून तुमचा सुवर्णकाळ सुरू! ” तर काय करणार, मी पुन्हा तो व्हिडिओ पूर्ण बघणारच! कारण भारतीय माणूस आशेवर जगतो… आणि धनु राशीवाला? तो तर पुढच्या तारखेवर! ” आता परिस्थिती अशी आहे की, मी भविष्य ऐकण्यासाठी पॉडकास्ट लावते… आणि पॉडकास्टवाले माझं भविष्य ऐकूनच नवीन तारीख देतात! ” 

थोडक्यात सांगायचं तर, स्थिती सध्या अशी आहे : “गुरू येतोय… शनी जातोय… राहू फिरतोय… केतू वळतोय… तारखा धावतायत… फक्त माझे अडकलेले पैसे आणि माझे मोठे यश, बहुतेक अजून GPS शोधत आहेत! ” 

टीप: (या लिहिण्यामागे कोणालाही दुखवण्याचा हेतू नाही, हा सहज माझ्या मनात आलेला एक विनोदी विचार आहे.) मी शास्त्राचा सन्मान करते.

┉❀꧁꧂❀┉

© तृप्ती देव

भिलाई, छत्तीसगड.

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “काळजी वाटते म्हणून” ☆ श्री मंगेश मधुकर ☆

श्री मंगेश मधुकर

? मनमंजुषेतून ?

☆ “काळजी वाटते म्हणून…” ☆ श्री मंगेश मधुकर

सकाळची नऊची वेळ, रस्त्यावर बऱ्यापैकी ट्राफिक होतं. अचानक “बुंगsssबुंग”असा मोठंठा आवाज आणि कर्कश हॉर्न वाजवत एक बाईकवाला  ओव्हरटेक करून वेगानं पुढे गेला. काही वेळातच धाड….. धाड असा आवाज झाला. गाडी घसरून तोच सुसाट बाइकवाला रस्त्यावर पडलेला. हातापायाला खरचटलेलं. सुदैवानं गंभीर दुखापत नव्हती पण मुका मार बराच लागलेला. बाईकवाला थरथर कापत होता. बघ्यांची गर्दी जमली. काही विचारपूस तर काही व्हिडिओ शूटिंग करत होते. तितक्यात पन्नाशीचे एक काका पाण्याची बाटली घेऊन आले. बाईकवाल्याला उठवून बसवलं. स्वतःच्या हातानं पाणी पाजलं. बिस्किटं खायला दिली. प्रेमानं, आपुलकीनं विचारपूस करत होते.

“बरं वाटतंय का? ”काका 

“हो”

“घाबरू नकोस. काही झालेलं नाही घरी फोन कर”

“नको. मी ओकेयं. ”

“माझं ऐक. कोणाला तरी बोलावून घे. एकटा जाऊ नकोस. ”

“नको. ममी टेंशन घेईल आणि पप्पांना कळलं तर…  ”हे ऐकल्यावर काकांनी खाडकन बाईकवाल्याच्या मुस्काडात मारली. सगळ्यांनाच धक्का बसला. बाईकवाला तर बधीर.

“ओ मारताय कशाला? ”संतापलेला बाईकवाला म्हणाला.

“अजून दोन देईन”

काकांनी पुन्हा मारायला हात उचलल्यावर बाईकवाला त्यांच्या अंगावर धावून गेला तेव्हा इतरांनी मधे पडत दोघांना शांत केल्यानं पुढचा अनर्थ टळला तरी बाईकवाला संतापानं धुमसत असताना  काका एकदम रडायला लागले.

“सॉरी!! माफ कर भावनेच्या भरात तुझ्यावर हात उचलला” काकांनी हात जोडले.

“तुम्ही हाफ मॅड ये का? ”बाईकवाला.

“फुल मॅड सुद्धा म्हणू शकतोस. माझी काळजी तुला कळणार नाही. घरी फोन कर म्हटल्यावर भीती वाटली पण जीव धोक्यात घालून गाडी चालवताना काही बरं वाईट झालं तर आईबापाची काय अवस्था होईल याचा कधी विचार केलायस का? केवळ आई-वडिलांची पुण्याई म्हणून आज वाचलास. ”बाईकवाला काहीच बोलला नाही.

“गाडी सावकाश चालव असं आईबाप सांगतात ती कटकट वाटते. माझ्या मुलगा सुद्धा तुझ्यासारखाच गाडी चालवायचा. हजारदा सांगितलं पण ऐकलं नाही. शेवटी अद्दल घडली.”

“काय झालं”

“गाडी स्लिप झाली. तीन महिने झाले. दोन्ही हात प्लास्टर मध्ये घेऊन घरात बसलाय. जीव वाचला पण परीक्षा बुडाली, वर्ष वाया गेलं. वेगाच्या नादात आयुष्याचं मातेरं करून घेतलं”काकांना खूप भरून आलं.

“आजकाल शायनिंगच्या नादात जोरात गाडी चालवण्याचं प्रमाण वाढलंय. गरज नसताना जीव धोक्यात घालतात. खूप भीती वाटते. कोणी जोरात गाडी चालवताना दिसलं की काळजात धस्स होतं. मुलगा डोळ्यासमोर येतो. कधी, काय होईल याचा भरवसा नाही. गाडी सावकाश चालव आणि हेल्मेट वापर. ”

काही क्षण शांततेत गेले.

“आजपासून नीट गाडी चालवेन. ममी-पप्पांची आणि तुमचीही शपथ. ” काकांचा हात हातात घेत बाईकवाला म्हणाला 

“अजून खूप आयुष्य आहे आणि रागवू नकोस. जे केलं ते फक्त काळजीपोटी… बाकी काही नाही. ” बाईकवाल्याच्या डोक्यावरून हात फिरवून काका निघून गेले.

 

© श्री मंगेश मधुकर

मो. 98228 50034

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ कोर्टाचा आगळावेगळा निर्णय – – लेख क्र. २ ☆ श्री सुधीर करंदीकर ☆

श्री सुधीर करंदीकर

? इंद्रधनुष्य ?

☆ कोर्टाचा आगळावेगळा निर्णय – – लेख क्र. २ ☆ श्री सुधीर करंदीकर

कोर्टाचा आगळावेगळा निर्णय – – घटना परदेशामधील कोर्ट

बेरोजगारी, कामधंदा न मिळणे, हा प्रकार सगळ्याच देशांमध्ये कमीजास्त प्रमाणात असतोच. त्यामुळे कमीजास्त प्रमाणात चोऱ्यामाऱ्या होणे, हे पण ओघानी येतेच.

परदेशामधली एक घटना आहे – एका माणसाला दोन दिवस काहीही काम मिळाले नाही, त्यामुळे ते दोन दिवस त्यानी उपाशी राहून कसेबसे काढले. काहीतरी काम मिळेल आणि पोटाला काही खायला मिळेल या आशेवर तिसरा दिवस उजाडला. तिसऱ्या दिवशी पण काम नाही आणि दोन दिवस पोटात अन्नाचा कण नाही, शेवटी अनावर होऊन त्यानी एका दुकानामधून ब्रेड चोरला आणि भूक थोडी शांत केली. दुकानदारानी त्याला पकडले आणि पोलीसांच्या हवाली केले.

कोर्टामधे केस उभी राहिली. उपस्थित मंडळी स्थानापन्न झाली. लिपिकानी केसची माहिती कोर्टाला वाचून दाखवली.

जज्ज : (आरोपी माणसाला) तू ब्रेडची चोरी केली, हे खरे आहे का? आणि केली असेल तर का केली? चोरी करणे हा गुन्हा आहे हे तुला माहित आहे ना?

माणसानी चोरी केल्याचे कबुल केले, चोरी करणे हा गुन्हा आहे, हे माहित असल्याचे पण कबुल केले, आणि चोरी का करावी लागली ते कारण पण त्यानी सांगितले.

त्याचे बोलणे ऐकून सगळ्यांनीच हळहळ व्यक्त केली. हा गुन्हा या वेळेस आरोपीला माफ करावा, अशी एका वकिलानी कोर्टाला विनंती केली. सगळ्यांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर जज्ज साहेबांनी असा निर्णय जाहीर केला – – 

जज्ज : आरोपीनी चोरी का केली, याचे कारण जरी पटण्यासारखे असले आणि चोरी तशी किरकोळच असली, तरी, चोरी करणे हा कायद्याने गुन्हाच ठरतो. आणि चोरी करणाऱ्यांना शिक्षा ही असतेच. आणि शिक्षेचे प्रयोजन अशाकरिता असते, की, त्यानी पुन्हा चोरी करू नये. ही जी चोरी केली आहे, त्याकरता १० डॉलर दंड भरणे ही शिक्षा आरोपीला कोर्ट देत आहे.

सगळेच उपस्थित लोक चेहेऱ्यावर हळहळ व्यक्त करतात.

जज्ज : अजून निर्णयाचे काम संपलेले नाही. आरोपी हा दंड भरू शकत नाही, हे कोर्टाला पक्के समजते आहे. म्हणून आरोपीतर्फे १० डॉलर ही दंडाची रक्कम मी आरोपीच्या वतीने कोर्टाकडे भरत आहे. असे म्हणून जज्ज नी खिशामधून १० डॉलर ची नोट काढून बाजूला बसलेल्या लिपिकाकडे दिली.

सगळ्यांच्या चेहेऱ्यावर समाधान उमटले.

जज्ज :  निर्णयाचा पुढचा भाग –  आपल्या देशात पोट भरण्याकरता माणसाला काम मिळू शकत नाही, ह्याकरता आपण सगळेच जबाबदार आहोत आणि शिक्षेला पात्र आहोत. म्हणून कोर्ट इथे हजर असलेल्या सगळ्यांना १० डॉलर दंड करत आहे. सगळ्यांनी दंडाची रक्कम सरकारी लिपिकाकडे जमा करायची आहे आणि मगच बाहेर पडायचे आहे.

सगळ्यांनीच आनंदी चेहेऱ्यानी १० – १० डॉलर जमा केले. २ मिनिटात २०० डॉलर जमा झाले.

जज्ज :  हे २०० डॉलर मिस्टर क्ष (चोरी करणारी व्यक्ती) यांना कोर्ट देत आहे. त्यांनी छोटा मोठा उद्योग सुरु करावा आणि मेहेनत करून आपली रोजी रोटी कमवावी. इथे कोर्टाचे या केसचे कामकाज संपते आहे.

मिस्टर क्ष नी खाली मान वाकवून जज्ज साहेबांचे आणि उपस्थितांचे आभार मानले.

सगळेजण जज्ज साहेबांना धन्यवाद देत आणि त्यांचे कौतुक करत बाहेर पडले.

© श्री सुधीर करंदीकर

मो. 9225631100 – ईमेल – srkarandikar@gmail. com

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ अथांग मुक्तधारा… कवयित्री : राजश्री पाटील ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

श्री सुनीत मुळे

? वाचताना वेचलेले ?

☆ अथांग मुक्तधारा… कवयित्री : राजश्री पाटील ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे 

प्रत्येकालाच कुठे जमते

सहज सुंदर बरसणे

​मनातली ओल जपत

पाऊस होऊन जगणे

 

​तो येतो तसाच

कोणताही मुखवटा न घालता

​धरेच्या कुशीत विरतो

स्वतःचे अस्तित्व न राखता

 

​आपण मात्र जगतो

हिशोबाच्या जगात भावनांच्या

​काठोकाठ भरूनही दाटतात

भिंती कोरड्या अहंकाराच्या

 

​पावसाकडे नसते कधी

भेदाभेदाची कोणतीच पट्टी

​तो सुवर्णमहालावरही बरसतो

आणि गरिबाच्या झोपडीवरही

 

​आपले प्रेम मात्र

शर्तींच्या चौकटीत अडकलेले

​माणसाचे दातृत्व नेहमी

स्वार्थाच्या तराजूत तोललेले

तो ढग होऊन येतो

आणि मुक्तहस्ते उधळतो

​आपण अमृताचा संचय करून

त्यालाच गळती लावतो

त्याच्या एका थेंबात

अंकुराचे प्राण हसतात

​आपल्या हजारो शब्दांत

नाते मात्र मुके राहतात

 

​निसर्गाचे हे देखणे रूप

कधीतरी माणसाला उमजावे

​पावसासारखे निखळ होऊन

फक्त देता देता उरावे…

कवयित्री : प्रा. राजश्री पाटील

प्रस्तुती : सुनीत मुळे

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ चिगोरात तिंतिणी ही… ☆ रेणुका धनंजय मार्डीकर ☆

रेणुका धनंजय मार्डीकर

?️?  चित्रकाव्य  ?️?

? चिगोरात तिंतिणी ही… ? रेणुका धनंजय मार्डीकर ☆

(भावगीत (वर्ण संख्या १६ यति ८ व्या अक्षरावर))

वसंताने आणलेली ग्रीष्मात बहरू येते 

चिगोरात तित्निणी ही रंगरूप नवे घेते ||ध्रु||

*

चिमण्याश्या लाल कळ्या पर्ण पाचूत सजल्या

सोनं पांढऱ्या पाकळ्या फुलोऱ्यात त्या रुजल्या

पाकळ्यांना छेडण्यास मधमाशी डंख देते

चिगोरात तिन्तिणी ही रंगरूप नवे घेते ||१||

*

दीर्घायुषी तरूवर दिसतात मनोहर

हरितपर्णिकामधे सजे फुलोरा सुंदर

चिंचबने फुलारली मोहक दिसती शेते

चिगोरात तिन्तिणी ही रंगरूप नवे घेते ||२||

*

कधी वाटे भरजरी अंगावरली शेलारी

शालू नेसून नवरी नटलेली दिसे न्यारी

गीत सुमधूर माझे चिंचेखाली मला नेते

चिगोरात तिन्तिणी ही रंगरूप नवे घेते ||३||

*

चिरमिर पानांच्या या अक्षताच पडतात

फुलोऱ्याची फुले त्यात पायघड्या घालतात 

छोटे छोटे डोकावती अम्लकीचे आकडे ते

चिगोरात तिन्तिणी ही रंगरूप नवे घेते ||४||

© रेणुका धनंजय मार्डीकर

औसा.

मोबा. नं.  ८८५५९१७९१८

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित / मंजुषा मुळे/ गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ शिवार पंढरी… ☆ डॉ.सोनिया कस्तुरे ☆

डॉ. सोनिया कस्तुरे

?️?  चित्रकाव्य  ?️?

? – “शिवार पंढरी…” – ? ☆ डॉ.सोनिया कस्तुरे ☆

मोटेचा आवाज | प्रवाह पाटाचा 

झुळूका वाऱ्याचा | पांडुरंगा ||१||

*
कांदा मुळा भाजी | गाते हिरवाई 

आमुची विठाई | काळी माय ||२||

*

टाळ मृदुंग ना | साथीला चिपळी 

औत बैल गळी | तालामध्ये ||३||

*

चंद्रभागा माझी | नाचते शिवारी

शिवार पंढरी| भासे जणू ||४||

*

वारी चालू वाटे | भेटावया तुला

म्हैस बैल गाया  |  साद घाली ||५||

*

सौख्य पंढरीचे | शिवारी खुलते

तुकोबा मनी ते | जनाबाई ||६||

*

पावसाच्या सरी | ओंब्या धान्य धरी

इथेच पंढरी | विसावली ||७||

*

सोनिया म्हणे हा | विठू मी पाहिला 

शिवारी थाटला | निसर्गात ||८||

© डॉ.सोनिया कस्तुरे

विश्रामबाग, जि. सांगली

भ्रमणध्वनी:- 9326818354

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ जय प्रकाश के नवगीत # १५२ ☆ सुलगती रात ☆ श्री जय प्रकाश श्रीवास्तव ☆

श्री जय प्रकाश श्रीवास्तव

(संस्कारधानी के सुप्रसिद्ध एवं अग्रज साहित्यकार श्री जय प्रकाश श्रीवास्तव जी  के गीत, नवगीत एवं अनुगीत अपनी मौलिकता के लिए सुप्रसिद्ध हैं। आप प्रत्येक बुधवार को साप्ताहिक स्तम्भ  “जय  प्रकाश के नवगीत ”  के अंतर्गत नवगीत आत्मसात कर सकते हैं।  आज प्रस्तुत है आपका एक भावप्रवण एवं विचारणीय नवगीत “सुलगती रात” ।)

✍ जय प्रकाश के नवगीत # १५२ ☆

सुलगती रात ☆ श्री जय प्रकाश श्रीवास्तव

धुआँ उठा है

कहीं रात सुलगी होगी।

 

तस्वीरों में

ओढ़े बैठे

कुछ नक़ली असली चेहरे

अभिव्यक्ति की

आजादी पर

बिठा रहे हैं बस पहरे

कौन सगा है

किस पर मूठ दगी होगी।

 

धार नदी के

सँग-सँग बहना

क्या बस नियति हुई ऐसी

घबराहट में

मौन सुलगते

स्थितियाँ मूक बधिर जैसी

कहाँ उगा है

सूरज,रात ठगी होगी।

 

ठोकर खाना

खाकर गिरना

गिर-गिर कर चलना दस्तूर

लिए विरासत

काँधे लादे

पग-पग उम्र हुई मजबूर

कहीं दगा है

कहीं रार उमगी होगी।

***

© श्री जय प्रकाश श्रीवास्तव

सम्पर्क : आई.सी. 5, सैनिक सोसायटी शक्ति नगर, जबलपुर, (म.प्र.)

मो.07869193927,

संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ ≈

Please share your Post !

Shares