मराठी साहित्य – मराठी कविता ☆ कवितेच्या प्रदेशात # ३३० ☆ मी… ☆ प्रभा सोनवणे ☆

प्रभा सोनवणे

? कवितेच्या प्रदेशात # ३३० ?

☆ मी ☆  प्रभा सोनवणे ☆

मी एक रेणू

तू विशाल आभाळ !

कसे समजेल तुला,

मन घायाळ घायाळ !

माझ्या वेदनेचे कुळ,

तुज सांगेल गोकुळ,

दूर वाजताच वेणू…..

होई राधिका व्याकुळ! !

© प्रभा सोनवणे

संपर्क – “सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार

पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011

मोबाईल-९२७०७२९५०३,  email- sonawane.prabha@gmail.com

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) –  उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित / मंजुषा मुळे/ गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ स्वप्नातले मी घरकुल… ☆ श्री शरद कुलकर्णी ☆

श्री शरद कुलकर्णी

? कवितेचा उत्सव ?

स्वप्नातले मी घरकुल☆ श्री शरद कुलकर्णी ☆

स्पर्शून अभावित गेली

तीही नकार लाट होती.

गावून आवर्जून गेली

तीही माझीच गाज होती.

आजमितीस तुझ्याचसाठी

होईन मी समुद्र.

उसळून लाटलाट

फेसाळून आर्त अ‍ार्द्र.

गेलीस पुसून अलगद

रेतीवरील जे रमल.

बांधीन पुन्हा विश्वासाने

स्वप्नातले मी घरकुल.

 

© श्री शरद  कुलकर्णी

मिरज

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ झेप ☆ शालिनी जोशी ☆

शालिनी जोशी

? विविधा ?

झेप ☆ शालिनी जोशी

निळा विशाल सागर. बाजूला एक कडा आणि त्याच्या शेजारी एक डोंगर. कड्याला एक कपार. एक छोटेसे पिल्लू त्या कपारीत येरझाऱ्या करीत होते. बरोबर कोणीच नाही. खायला काही नाही. रोज मासे आणून प्रेमाने भरवणारी आई, प्रेमाने पाठीवरून चोच फिरवणारे वडील, मजेत खेळणारी तीन भावंडे सर्व कालच त्याला सगळे सोडून गेले. समोर डोंगरावर ती सगळी विहरताना दिसत होती. पण पिल्लू तिथे पोहोचू शकत नव्हतं. कडेला येऊन समुद्राकडे लक्ष दिले की त्याच्या पोटात गोळा येई. पाय लटपटू लागत. समोर मासा तोंडात घेतलेली आई दिसे. ती प्रेमाने आपल्याला पहाते आहे. हे कळे पण–

काल जाताना सर्वांनी त्याला बरोबर येण्याचा खूप आग्रह केला. पण भीतीने देह हवेत सोडून देण्याचा धीर पिल्लूला झाला नाही. वडील शेवटी रागावते, असे केलेस तर उपाशी मरशील. बहीणही ओढत होती. शेवटी नाईलाजाने सर्व सोडून गेले. तो पिल्लू विचार करून थकला. भूक भागवण्यासाठी घरट्यातील अंड्याची टरफले चाटण्याचा प्रयत्न केला. जणूं स्वतः स्वतःला खाल्ले. शेवटी निराशेने बाहेर बघू लागला.

वडील हवेत गिरक्या घेत होते. तीनही भावंडे खालीवर करीत होती. कधी पाण्याकडे झेपावत होती. इतक्यात आई तोंडात मासा घेऊन त्याच्याकडे येताना दिसली. खूप आनंदाने तो चोच उघडूनच बसला. पण आई जवळ आली नाही. लांबूनच खाली वर उडत मासा दाखवत होती. कधी मासा तोंडात जातो असे त्याला झाले होते. आईचा त्याला राग आला. त्या भरात त्याने डोळे मिटले, तो पुढे सरकला. आणि काय झाले त्याचे त्यालाच कळले नाही. खूप हलके हलके वाटत होते. त्याचे पंख उघडले होते आणि तो वरवर जात होता. नकळत तो खाली झेपावला. समुद्राच्या पाण्यातल्या माशांकडे लक्ष वेधले. पाण्याचा पायाला स्पर्श झाला. पण तो पाण्यात खाली गेला नाही. अलगत त्याने माशाला चोचीत धरले. वरवर जाऊ लागला. उडण्याची कला त्याला साधली.

सर्वांना आनंद झाला. भावंड आजूबाजूला, वडील वरती, आई खालती. सर्व कुटुंबाने सुखाने हवेत रिंगण घेतलं. पिल्लूचा पराक्रम सर्व साजरा करत होते. आईच्या नजरेत वेगळच समाधान होतं. पिल्लू स्वावलंबी झालं. वडिलांना कृतार्थ वाटलं. जगाच्या पसाऱ्यात वावरण्यास ते लायक झालं. आनंदाने वर निळ्या आकाशात, खाली निळ्या सागरात विहरू लागलं. आई-वडिलांनी आपलं कर्तव्य पार पाडलं. भित्र्या मुलाला पंख फुटले. अनंत आकाश त्याचं घर झालं.

अशी ही छोट्या समुद्रपक्षाची कथा. मुलासाठी आई-वडील काहीही करायला तयार असतात. त्यांचे हित हाच हेतू असतो. जगात त्याला ताठ मानेने स्वकर्तुत्वावर जगता यावे हीच इच्छा असते. त्यासाठी रागालोभाचे मार्ग आचरावे लागतात.

 (मारूती चितमपल्ली यांचे पक्षी जाय दिगंतरा कथेवर आधारित)

©  शालिनी जोशी

संपर्क – फ्लेट न .3 .राधाप्रिया  टेरेसेस, समर्थपथ, प्रतिज्ञा मंगल कार्यालयाजवळ, कर्वेनगर, पुणे, 411052.

मोबाईल नं.—9850909383

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित / मंजुषा मुळे/ गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ “अरे देवा…” ☆ नीता चंद्रकांत कुलकर्णी ☆

नीता कुलकर्णी

☆ “अरे देवा…” ☆ नीता चंद्रकांत कुलकर्णी

सकाळ झाली. रोजच्या सारखे गुरुजी पूजा करण्यासाठी देवळात निघाले. पूर्वी देऊळ साधेसुधे होते. आता भव्य बांधले होते. पायरीला नमस्कार करून गुरुजी आत आले. अजून चार गुरुजी त्यांच्याबरोबर होते. ते पाचजण मिळून पूजा करत असत. चांदीचा भला मोठा दरवाजा उघडला होता. समोरच सोनं, मोती, हिऱ्याच्या दागिन्यांनी सजलेली देवाची मूर्ती होती. नमस्कार करून त्यांनी पूजा सुरू केली. प्रथम काळजीपूर्वक एकेक दागिना काढायला सुरुवात केली. दुसरे गुरुजी ते दागिने पेटीत ठेवायला लागले. प्रत्येक वाराचे दागिने वेगळे होते.

शुद्ध पाण्याने देवाचे स्नान झाले. चांदीच्या पाच भांड्यात पंचामृत होते. ते घातले.. नंतर कोमट पाण्याने देवाला स्नान घातले. पंचाने देवाला पुसले. पितांबर नेसवला. अंगरखा घातला. शेला पांघरला. आणि नेहमी प्रमाणे दागिने घालायला सुरूवात केली.

सर्वात मोठा सोन्याचा हार देवाच्या गळ्यापाशीं नेला आणि काय झालं कळलं नाही… हार गळून पडला..

“फासा तुटला का काय” एक गुरुजी म्हणाले 

हातात घेऊन बघायला लागले तर तो नीट होता. परत त्यांनी हार घेतला आणि घालायला लागले तर तो खाली घरंगळला… ” अरेच्च्या अस काय होतय.. ” गुरुजींनी हार बाजूला ठेवला. आणि हिऱ्याची कंठी घेतली. ती घालायला लागले तर ती पण खाली आली. दुसऱ्या गुरुजींनी प्रयत्न केला तरी तसंच…

तिसरे गुरुजी देवाजवळ आले. त्यांनी मोठी मोत्याची माळ घालायचा प्रयत्न केला तर.. ती अचानक तुटलीच. मोती विखरून पडले. आता मात्र सगळे घाबरले. आज कुठलाही दागिना देवाला घालता येत नव्हता.

काहीतरी विपरीत घडते आहे याची जाणीव झाली. हे बघून सगळेजण घाबरले. ताबडतोब ट्रस्टींना फोन केला. ते धावत आले. त्यांनी वेगवेगळे दागिने घेऊन घालायचा प्रयत्न केला पण आज एकही दागिना मूर्तीवर टिकत नव्हता.

गुरुजींना काय वाटले कोण जाणे.. त्यांनी शेवंतीच्या फुलांचा हार देवाच्या गळ्यात घातला. तो मूर्तीवर स्थिर राहिला. हे काय गुढ आहे हे कोणाला उमगेना…

ही वार्ता लगेचच गावात पसरली. देवाला बघायला खूप गर्दी झाली. आज देवाचे मूळ रूप सर्वांसमोर होते.

जवळ राहणारी म्हातारी काठी टेकत निघाली. ” मला देवाला बघु दे.. ” म्हणायला लागली.

लोकांनी तिला वाट करून दिली. जवळ जाताच म्हातारीला रडू आले. ती देवाशी बोलायला लागली.. म्हणाली.. ,

” किती दिवसांनी दिसलास रे. सोन्या, मोत्यांच्या, हिऱ्यांच्या दागिन्यात पार बुडून गेला होतास. तुझ्या ह्या रूपाचं दर्शन घ्यायला डोळे आतुरले होते रे.. आज माझा जीव सुखावला. माझा देव दिसला… मला भेटला… “

म्हातारीच बोलणं ऐकून लोकांचे डोळे भरून आले…

प्रसादासाठीचे पेढे, बर्फी, लाडू यांनी भरलेले चांदीचे मोठे बाऊल बाजूला होते. म्हातारीने हातातले मूठभर शेंगदाणे देवाच्या तोंडाशी नेले… खा रे देवा… देव तिच्याकडे बघून हसला…

असा तिला भास झाला. अत्यंत प्रेमाने देवाकडे बघत म्हातारीने हात जोडले..

दागिन्यांची ही अतर्क्य गोष्ट सर्वांसमोर घडली होती. अवाक् होऊन गुरुजी बघत होते. जे घडत आहे त्याचा अर्थ काय असेल… याचा सगळे विचार करायला लागले. तो उमगायला थोडा वेळ जावा लागला. देवाला दागिने नको आहेत का? असाच प्रश्न मनात आला.

देव भावाचा भुकेला आहे. त्याला हे दिखाऊ सुंदरपण नको… तर निर्मळ मन हवं आहे. हे त्यांच्या लक्षात आले. देवाच देवपण सोन्या चांदीत नाही… दगडातल्या त्या… देवपणाच दर्शन आज भाविकांना झालं.

देवाला दागिने घालायची हौस आपल्याला आहे. तो निर्गुण निराकार आहे. त्याच्या मूळ मूर्तीचे दर्शन घेऊन सर्व भाविकांना मनोमन आनंद होत होता. प्रत्येकजण सुखावला होता… विचार विनिमय.. चर्चा करत आपापसात लोक बोलत होते.

त्यांना समजलं की देवानी आज आपल्याला हे लक्षात आणून दिलेले आहे. आता आपण प्रत्येक कृती करताना विचारपूर्वक करायला हवी आहे. मी जे करतो आहे ते देवाला आवडेल का? हे प्रत्येकानी स्वतःच्या मनाला विचारायला हवे आहे. आपले वागणे संयमपूर्वक हवे.

पटलं का तुम्हाला.. तुम्ही सुज्ञ आहात. ही कथा का लिहिली… हे तुम्हाला कळले असेलच. ते अंतःकरणापासून जाणून मात्र घ्या.. आणि मुख्य म्हणजे तस वागायचा प्रयत्न करा… श्रद्धा ठेवा पण त्याबरोबर विवेकाची साथ असू दे.

© नीता चंद्रकांत कुलकर्णी

मो 9763631255

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ गणपती बाप्पाच्या मनातलं! ☆ श्री सुधीर करंदीकर ☆

श्री सुधीर करंदीकर

? मनमंजुषेतून ?

☆ गणपती बाप्पाच्या मनातलं! ☆ श्री सुधीर करंदीकर

आज सकाळचीच ही घटना आहे. उद्याची सगळी तयारी झाली होती. सकाळी लवकर जाऊन बाप्पांची मूर्ती पण घेऊन आलो होतो.

माझ्या नित्य नियमाप्रमाणे सकाळी सकाळी टेबलवर चार वर्तमानपत्रे आलेली होती. माझे वर्तमानपत्रांचे पारायण सुरू होते, अधून मधून फेसबुक आणि वॉट्सअप कडे पण भटकंती सुरू होती. आणि गरमागरम चहा पण घेत होतो.

अचानक स्वयंपाक घरातून मस्त गोडसर असा सुंदर वास यायला लागला. बायकोला आवाज दिला आणि विचारलं – आज काय स्पेशल आहे? सुंदर गोड वास येतोय.

बायको – अहो उद्यापासून गणपती उत्सव सुरू होतोय. रोजच्या संध्याकाळच्या प्रसादाकरता पंचखाद्य करते आहे.

मी सहजच मनात म्हटलं – गणपती बाप्पा तुम्हाला गोड आवडतं म्हणून प्रसादाकरता सुंदर पंचखाद्य तयार होतय, आणि रोजच्या सकाळच्या प्रसादाकरता मोदक, शिरा असे गोड पदार्थ असणारच आहेत.

आपल्या दारावर जसा टकटक आवाज येतो, तसाच काहीतरी आवाज देवघरामधून येतोय असा मला भास झाला. माझ्या काही लक्षात येईना. मी इकडे तिकडे बघत होतो, तेवढ्यात देवघरातून कुणीतरी बोलतय असं वाटलं, म्हणून देवघराकडे गेलो, आणि माझी शंका खरी ठरली. तिथूनच बोलण्याचा आवाज येत होता.

देवघरा मधून : मी गणपती बाप्पा बोलतोय

मी चांगलाच गडबडलो. मी स्वतःला दोन-तीन ठिकाणी चिमटे काढून बघितले. सगळ्याच ठिकाणी चिमटे जाणवत होते, म्हणजे मी शुद्धीवर नक्कीच होतो. म्हणजे देवघरातली आज आणलेली गणपती बाप्पांची मूर्तीच बोलत असणार. मी वाकून नमस्कार केला.

देवघरातून : सुखी राहा. तुझा अंदाज बरोबर आहे. मीच गणपती बाप्पा बोलतोय.

मी पुन्हा वाकून नमस्कार केला.

गणपती बाप्पा : तुला कोणी सांगितलं की मला गोड आवडतं म्हणून

मी : तसं सांगितलं कोणीच नाही. पण फोटोमध्ये तुमच्या समोर मोदकांचं आणि गोड पदार्थांची ताटे असतात, सगळ्या गणपतीच्या देवळांमध्ये उत्सवाच्या वेळेस आणि रोजच गोड पदार्थांचा प्रसाद असतो, बऱ्याच पौराणिक कथांमध्ये पण तसा उल्लेख आहे. आम्ही आपलं तेच खरे मानून सुरू ठेवतो. आमचं काही चुकत असेल तर सांगा

गणपती बाप्पा : तुम्ही प्रसाद म्हणून मोदकाचे ताट माझ्यासमोर ठेवता, पण पूजा झाल्यानंतर किंवा आरती झाल्यानंतर मी खाल्ल्यामुळे काही मोदक कमी झाले आहेत कां? किंवा लाडू कमी झाले आहेत, शिरा कमी झाला आहे, असं कधी बघितलं आहे कां?

मी : नाही, तसं दिसलं कधीच नाही. आणि कुणी तसा विचार केला असेल असे पण वाटत नाही. सगळेच जण देवासमोर नैवेद्य दाखवतात, आणि आरती संपली की लगेच त्याचे वाटप आणि खाण्यास सुरूवात होते. तुम्ही खाल्लाय का नाही, हा विचारच कोणाच्या मनात येत नसावा. तुम्हाला गोड खरोखरच आवडत नाही का!

गणपती बाप्पा : आवडत नाहीच, असं नाही, पण मला गोड पदार्थांपेक्षा गोड माणसं जास्त आवडतात. माणसं म्हणजे स्त्री – पुरुष – मुलं – मुली असे सगळेच त्यामध्ये आले. गोड माणसे म्हणजे काय ते लक्षात आलं ना!

मी : अर्थ समजेल असं लक्षात येत नाहीये

गणपती बाप्पा : गोड माणसं म्हणजे नेहमी गोड बोलणारी माणसं मला आवडतात. नुसतं वरवर गोड बोलणारी माणसं घराघरात आणि समाजात सगळ्याच थरांमध्ये आहेत. आपल्या बोलण्यामुळे समोरची व्यक्ती दुखावल्या जात असेल, तिला कमी लेखण्याचा प्रयत्न आपल्या बोलण्यात असेल, बोलण्यात अहंभाव म्हणजे मी आहे म्हणून सगळे आहे – असा भाव असेल, तर या बोलण्याला गोड बोलणे म्हणत नाहीत. गोड बोलणं हे मनापासून असलं पाहिजे.

आपापसात गोडी निर्माण करणारी माणसं मला आवडतात. कुठलीही अपेक्षा न ठेवता आपल्याकडून होईल तेवढी मदत इतरांना करणारी माणसं सभोवार गोडी निर्माण करत असतात, ती मला आवडतात.

गोड स्वभावाची माणसं मला आवडतात. यांचा स्वभाव स्वच्छ असतो, मनामधे घमंड नसते, मनात कपट नसतं. मनात कुणाला फसवणे किंवा कोणाला फसवून आपला फायदा करणे हा विचार नसतो. कुणाला त्रास देणे, मारहाण करणे, अशी यांची विचारसरणी नसते.

मला गोड हसणारी माणसे आवडतात. काही माणसांचे चेहेरे कायम एरंडेल तेल प्यायल्या सारखे असतात. मी त्यांना आतून सुचवत असतो, कि काळजी माझ्यावर सोडा, थोडे मोकळे व्हा, पण कुणाचं माझ्या सांगण्याकडे लक्षच नसत. खोटे हसणारी माणसे पण भरपूर आहेत. पण अशा लोकांच्या हसण्यात खळखळणारा गोडवा नसतो कारण त्यांच्या मनात गोडवा नसतो.

सर्वांगाने गोड असणारी माणसं मला आवडतात. समोरच्या व्यक्तीमध्ये तुम्हाला देव बघता आला, तर तो तुमच्या मनाचा गोडवा, आणि ती तुमची खरी उंची.

माझ्या करता प्रसाद गोड ठेवला काय, किंवा तिखट ठेवला काय, किंवा आंबट ठेवला काय, मला काहीच फरक पडत नसतो, कारण मी यामधलं काहीच खाणार नसतो. तुम्हीच तो प्रसाद संपवणार असता. उत्तम तब्येतीकरता खरंतर गोड तिखट कडू आंबट खारट तुरट अशा सगळ्याच चवी थोड्या थोड्या प्रमाणात पोटात जाणे जरुरी असते. म्हणून नेहेमी अशा विविध चवींचे प्रसाद असावेत.

दुसरा विचार म्हणजे चतुर्थीला तुम्ही आपापल्या घरी माझी स्थापना करता आणि दीड दिवसांनी / ५ दिवसांनी / अनंत चतुर्दशीला माझे विसर्जन करता. विसर्जन का करता हे मात्र मला समजत नाही, माझी तर राहण्याची इच्छा असते. सगळेजण विसर्जन करताना “गणपती बाप्पा मोरया आणि पुढच्या वर्षी लवकर या” गर्जना करत करत विसर्जन करतात. तुमच्या ‘लवकर या’ ह्याला प्रतिसाद म्हणून बऱ्याच वेळा तुमच्याकडे लवकर जावं अशी माझी इच्छा होते, पण येता येत नाही कारण पुढच्या वर्षीच्या भाद्रपद महिन्यातली चतुर्थी उजाडते तेव्हाच तुम्हाला माझ्या येण्याचे वेध लागतात.

विसर्जन करताना बरेच जण “गणपती चालले गावाला, चैन पडेना आम्हाला” अशा गर्जना करतात. खरं तर मला गावाला जायचंच नसतं कारण मलाच चैन पडणार नसते. असो,

माझी किंवा कुठल्याही देवतेची स्थापना तुमच्या घरात उत्सवाच्या स्वरूपात कायमस्वरूपी असावी असे मला वाटते, कारण त्यात तुमचाच फायदा आहे.

आता बघा, घरात दोघेजण असले तरी त्यांची तोंडे विरुद्ध दिशेला असतात, संवाद नसतो. घरात चार जण असले, तर तोंडे चार दिशेला आणि संवाद शून्य. अशा घरपणाला काय अर्थ आहे. गणपतीच्या दिवसात घरातली सगळी मंडळी आरतीच्या निमित्ताने एकत्र येतात, जवळपासचे नातेवाईक / मित्रमंडळी पण मुद्दाम घरी येतात, मनोभावे देवाची पूजा होते, आरती होते, पौष्टिक पदार्थांच्या प्रसादाची देवाणघेवाण होते, एकमेकांची चौकशी/ विचारपूस होते. आणि त्यावेळेस सगळ्यांच्याच चेहऱ्यावरती मला निख्खळ आनंद दिसत असतो. आणि यालाच घराला घरपण आहे असे म्हणतात. किती मोठा प्लस पॉईंट आहे हा तुमच्याकरता.

तुम्ही घरामध्ये वर्षभर म्हणजे कायमस्वरूपी गणपतीची स्थापना ठेवली, तरी, मी घरात आहे म्हणून तुम्हाला वेगळे असे काहीच करावे लागणार नाही. तुम्हाला कुठे बाहेर जायचे असेल, तर नेहेमीप्रमाणे तुम्ही घराला कुलूप लावून जाऊ शकता. मला घरातून बाहेर जाण्याकरता किंवा आत येण्याकरता घराचे दार उघडे पाहिजे असं काहीच नाही. रोज आरती / पूजा / फुले / प्रसाद पाहिजेच असे पण काही बंधन नाही. मी उत्सवाच्या स्वरूपात कायम घरात असलो, कि, घरातल्या सगळ्यांच्या सोयीने ठराविक वेळेला सगळेजण रोज एकत्र येतील, महिन्यातून एक दिवस / पंधरा दिवसातून एक दिवस मित्रमंडळी, गावातले नातेवाईक एकत्र येऊ शकतील. संवाद होईल, गप्पा होतील. सगळेजण मोबाईल, टीव्ही बंद करून पूजा / आरती करतील, एकमेकांची विचारपूस करतील. सगळ्यांना आवडेल असं काहीतरी प्रसाद म्हणून एकत्र बसून खाणे होईल. आणि याच बांधिलकीनी तुमच्या घराला कायमस्वरूपी घरपण येणार आहे. घराला घरपण आलं की तुमच्या मध्ये आपोआपच गोडी निर्माण होईल. आणि मी आधी म्हटल्याप्रमाणे मला गोड पदार्थांपेक्षा गोड माणसं आवडतात. ट्यूब पेटते आहे का?

मी : बाप्पा, असा विचार माझ्या तर कधी डोक्यात आलाच नाही. मी तर नक्की यापुढे असेच करणार आणि यावर थोडं लिहून ते ओळखीच्यांना पण कळवणार हे नक्की

गणपती बाप्पा : तथास्तु

मी एकदम तंद्रीतून जागा झाल्यासारखा जागा झालो. गणपती बाप्पा ने सांगितलेले सर्व विचार माझ्या डोळ्यासमोरून जायला लागले.

मी माझे गणपती बाप्पा बरोबरचे हे बोलणे बायकोला / मुलींना सांगितले, काही मित्रांना फोन करून सांगितले. पण घरातले गणपती बाप्पा बोलले आणि ते पण चक्क माझ्याशी, ही विश्वास न बसण्यासारखीच गोष्ट असल्यामुळे कोण विश्वास ठेवणार! तुमचाही कदाचित विश्वास बसणार नाही.

असो, आपल्या घरातल्या सगळ्यांनी गोड व्हावे हे तर नक्कीच सगळ्यांना पटण्यासारखे आहे. बरं गोड माणसं सगळ्यांनाच आवडतात हे सत्य आहेच. आणि जो आवडतो सर्वांना तोचि आवडे देवाला हे पण आपण जाणतोच. आणि याकरता करायचे काय आहे? तर घरामध्ये बाराही महिने गणपतीची स्थापना! आणि ती कशी! तर, घरातल्या सगळ्यांनी कायम गोड बोलून, गोड वागून, गोड हसून.

चला तर मग – 

“गणपती बाप्पा मोरया…

नेहमीच आमच्या घरात राहा…”

 © श्री सुधीर करंदीकर

मो. 9225631100 – ईमेल – srkarandikar@gmail. com

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ “मला भेटलेली एक सुंदर स्त्री…!!!” ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

डॉ अभिजीत सोनवणे

© doctorforbeggars 

? मनमंजुषेतून ?

☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ “मला भेटलेली एक सुंदर स्त्री…!!!☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

भिक्षेकऱ्यांना तपासून झाल्यावर एका संध्याकाळी सगळी कामं आटोपुन मंदिराबाहेरील एका आडबाजुच्या बाकड्यावर बसलो होतो. अंधार पडत चालला होता, वर्दळही फारशी नव्हती. घरी जायच्या आधी कोणाचे काही कॉल्स, व्हॉट्स ऍप बघावं म्हणुन मोबाईल काढला…. बघतो तो हँगझालेला… बापरे!

बरेच महत्त्वाचे कॉल्स आता कसे करायचे? मोबाईल चालु करण्याचा खटाटोप चालु झाला… वैताग आला… मोबाईल काही सुरु होईना ….

काय करावं या विचारांच्या तंद्रीत असतांनाच खांद्यावर कुणीतरी हात ठेवला आणि घोगऱ्या आवाजात कुणीतरी विचारलं, “कोण हाय …? ”

मी तंद्रीतुन जागा होत एकदम दचकलो आणि वर पाहिलं तर बघुन भिती वाटावी अशा विचित्र चेहऱ्याची एक आजी शेजारी उभी….

आधी घाबरलो, पण नंतर चिडुन विचारलं, ‘काय बाई, हि काय पद्धत आहे का? दिसतंय का नाही तुला? आंधळी आहेस का? फटकन येवुन अशी अंगावर हात काय ठेवतेस… घाबरलो ना मी! ‘

तशी म्हणाली, ‘आवो मला दिसत नाय, खरंच मी आंदळी हाय, हितंच बाजूच्या पुलाखाली ऱ्हाती, या टायमाला मी हितंच बसुन भाकर खाती… मापी करा, मी जाते दुसरीकडं…” 

मी ओशाळलो, म्हटलं, ‘नाही मावशी बसा इथंच, मी चाललोच आहे…’

तिला बघुन अंगातला डॉक्टर जागा झाला, जाता जाता म्हणालो, ‘डोळे कशानं गेले, आजी?

म्हणाली, “लहानपणी डोळ्यातनं पाणी येत व्हतं, लइ दुकायचे डोळे, आयबापानं गावातल्या भगताला दाखवलं, त्यांनं कायतरी औशद सोडलं डोळ्यात, मरणाची आग झाली, नंतर डाक्टरला दाकवलं, डाक्टर म्हणला, भगतानं जे टाकलं ते कसलंतरी ऍशीड व्हतं, डोळं आतुन जळल्यात. ‘

तवापासुन दिसणंच बंद झालं, 17 वर्साची व्हते मी तवा…

अरेरे! तुमच्या आईबापाच्या आणि भगताच्या चुकीमुळं डोळे गेले तुमचे, आधीच ते डॉक्टरांकडे गेले असते तर हि वेळ नसती आली…बेअक्कल असतात लोकं…

मी सहज बोलुन गेलो. यावर मला वाटलं, माझ्याच सुरात सुर मिसळुन ती आता तिच्या आई बापाला भगताला शिव्या शाप देईल… पण नाही.

ती म्हणाली, ‘नाय वो कुनाच्या आयबापाला वाटंल आपल्या तरण्या पोरीचं डोळं जावं म्हणुन? बिचाऱ्यानी त्यांना जे जमलं ते केलं… ‘

खेड्यात कुटनं आनायचा डाक्टर? आनी आला तरी त्याला पैसं कुटनं दिलं आस्त?

माजं डोळं गेल्यावर डोकं आपटुन आपटुन माजा बाप गेला …त्या बिचाऱ्याची काय चुक व्हती?

माज्या आईनं, एकांद्या लहान बाळावानी माजं सगळं केलं… डोळं आसताना जेवडी माया नाय केली, त्याच्या पेक्षा जास्त माया तीनं डोळं गेल्यावर केली..

मी चांगली आसते तर येवडी फुलावानी जपली आसती का मला? डोळं गेल्याचा आसाबी फायदा आसतुया… हसत ती म्हणाली…

वाईटातुन सुद्धा किती चांगलं शोधण्याचा प्रयत्न करत होती हि आज्जी?

तरी मी म्हणालो, ‘मग भगताचं काय? त्यांनं तर चुकीचं औषध सोडलं ना? ‘

ती म्हणाली, ‘आसं कसं म्हणता सायेब, माजं डोळं काय मुद्दाम घालवलं का त्यानं? आवो मला ते औशद लागु न्हाई झालं त्याला त्यो तरी काय करणार?

आवो माजं डोळं जाणारंच होतं, त्याला त्यो निमित्त झाला फक्त… 

माज्याच नशीबाचे भोग हुते ते… त्या बिचाऱ्याचा दोष न्हाई… 

कुणी काही चांगलं करायला गेलं आन चुकुन वाईट झालं तर त्याला दोष देवु नाई!

डाक्टर सुई टोचतो, पण बरं वाटावं म्हणुनच ना? त्याचा दुकवायचा इचार नसतो त्यात… 

आपुन आसं समजुन घेतलं तर कुणाचा राग कशाला येईल…?

Intention is important behind every action या वाक्याचा सार या आजीने किती सहज सांगीतला!

‘पण आज्जी इतकी वर्षे तुम्ही काहीही न बघता कशा राहु शकला? ‘

यावर आश्चर्य वाटून ती म्हणाली, न बघता…??? आवो काय बघायचं राहिलंय? सगळं बगुन मनात साटवलंय म्या … 

वासराला दुध पाजताना गाईचं डोळं म्या पायलेत, सगळा भात माज्या ताटात टाकुन उपाशी हासत झोपणारी आई म्या पाह्यलीय, पिल्लाच्या चोचीत घास भरवणारी चिमणी म्या बगीटली, कुत्र्याच्या पिल्लाला दुध पाजणारी शेळी म्या बगीटली, फुटलेल्या छपरातनं आत येणारं चांदणं म्या बगीटलंय, मातीतनं उगवणारा कोंब म्या पाह्यलाय…

तुमी काय बगीतलं ह्यातलं? आवो ह्ये सगळं बगुन झाल्यावर राह्यलंच काय बगायला? ”

तीच्या प्रश्नाला उत्तर नव्हतं माझ्याकडे!

आज्जी तुमचं लग्न…? चाचरत मी विचारलं… 

आज्जी म्हणाली, झालं हुतं की, त्यो बी आंदळा हुता, त्यानंच आणलं पुण्याला मला….

पदरात एक पोरगी टाकली, त्याच्या पुण्याईनं पोरगी आंदळी नव्हती… 

म्हणलं, चला चांगलं दिवस आलं… पन त्योबी दोन तीन वर्षातच गेला… बरं झालं बिचारा त्यो तरी सुटला!

आणि आज्जी तुमची पोरगी? ती कुठाय?

आज्जी भकास हसली, म्हणाली, तीच्या विसाव्या वर्षी ती गेली तीच्या बापामागं त्याला शोधायला… 

आता दोगं वरनं माजी मजा बगत आसतील… 

स्वर्गात म्हणं नाचगाणी चालत्यात रोज, पन आमच्या नवऱ्याच्या नशीबात ते बी न्हाई मेल्यावर सुदा, डोळंच न्हायित, त्यो तरी काय करंल बिचारा… ‘ असं म्हणुन आज्जी हसायला लागली…

पण मी सुन्न झालो, काय बोलावं हेच कळेना….

इतकं सगळं भोगुनही हि इतकी निर्विकार!

आज्जी, या सगळ्यात दोष कुणाचा?

कुणाचाच न्हाई, परत्येकानं आपापलं काम केलं, ज्याचा त्याचा मोबदला ज्याला त्याला मिळाला… आपल्या वाट्याला आलं ते घ्यायचं, का आन कसं ते इचारायचं न्हाइ… 

भाकर मिळाली तर म्हणायचं आज आपली दिवाळी, ज्या दिशी मिळणार न्हाई म्हणायचं, चला आज उपास करु… 

दोष कुनाला द्यायचा न्हाई… वाईटातबी चांगलं शोधलं तर माणसाला वाईट वाटायचं कायी कारणच न्हायी.

ते कसं आज्जी? मला नाही समजलं!

ह्ये बगा सायेब, एकाद्याचा हात जरी तुटला तरी त्यानं म्हणावं, एकच हात तुटलाय, दुसरा तरी हाय चांगला, दोनी हात गेलं तरी म्हणावं, पाय तरी हायेत माजे आजुन… 

आता माजं बगा, दोनी डोळं गेलं तरी बोलता येतंय ना मला?

काय बोलावं मलाच कळेना, या विद्रुप चेहऱ्यामागे किती विद्वत्ता दडली होती?

वयामुळं हा पोक्तपणा आला असेल कि, भोगलेल्या सर्व यातनांमुळे मनाला आलेला हा बधीरपणा असेल?

काहिही असो एव्हढ्या सुंदर विचाराची, वाईटातुन चांगलंच शोधण्याचा प्रयत्न करणारी, वरवर विचित्र दिसणारी आजी तेव्हा मला जगातली सर्वात सुंदर स्त्री भासली!!!

© डॉ अभिजित सोनवणे

डाॕक्टर फाॕर बेगर्स, सोहम ट्रस्ट, पुणे

मो : 9822267357  ईमेल :  abhisoham17@gmail.com,

वेबसाइट :  www.sohamtrust.com  

Facebook : SOHAM TRUST

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ सियाचीनचे वाघ! ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

सियाचीनचे वाघ! ☆ श्री संभाजी बबन गायके 

 – – कर्नल विजयंत कुमार आणि शिपाई सरदार सिंग!

सुमारे ७६ किलोमीटर्स लांबी आणि सुमारे २ ते ८ किलोमीटर्सची रुंदी असलेल्या एखाद्या भूभागाची किंमत ती कितीशी असणार? किंमत प्रचंड आहे… ८६९ जीव!

हा काही जमिनीचा सामान्य तुकडा नाही. इथं जर पाय रोवून उभं नाही राहिलं तर काहीच काळात ती जागा शत्रू गिळून टाकेल… आणि मग आणखी आत येईल आपल्या भूभागाचा लचका तोडायला! म्हणून एवढी मोठी किंमत चुकवून आपले लोक इथं लढत असतात.. शत्रूशीही आणि इथल्या हवामानाशीही. समुद्रसपाटीपासूनची उंची ५७५३ मीटर्स म्हणजे १८८७५ फूट. ज्या ऋतूला आपण साधारणपणे उन्हाळा म्हणतो त्या दिवसांत इथं सपाटीवर तापमान १० अंश असते… त्याचवेळी तिथून सुमारे १८०० फूट उंचीवर हेच तापमान शून्याखाली २० ते कितीही खाली जाते! ही सियाचीनची अल्पशी ओळख.

इथं माणूसच काय पण कोणताही प्राणी जिवंत राहूच नये, असा जणू निसर्गाने चंगच बांधलेला आहे. पण देशाच्या सीमांचं रक्षण करण्याच्या कार्यात निसर्गाला तोंड देण्याशिवाय पर्यायच नाही ठेवलेला आपल्या शत्रूने. १९८४ मध्ये पाकिस्तान आपल्या या हद्दीत घुसण्याच्या मार्गावर असतानाच अगदी काहीच दिवस आधी ऑपरेशन मेघदूतने बाजी मारली! सियाचीनच्या बर्फाच्छादीत प्रदेशावर १९७९ मध्ये भारतीय सैन्याचे पर्वतारोही अधिकारी ब्रिगेडीअर श्री. नरेंद्र कुमार यांनी एखाद्या गरुडाच्या नजरेसारखी तीक्ष्ण नजर फिरवली… त्यांच्या लक्षात आलं की आपल्या भूभागावर पाकिस्तान आक्रमण करू शकतो… त्यांनी या कठीण तापमानात अनेक मोहिमा हाती घेतल्या आणि अत्यंत सविस्तर अभ्यास करून अहवाल दिला! १९८४ मध्ये भारताने सियाचीनवर पावलं रोवली! कुमार साहेब सियाचीनचं वर्णन ‘एक प्रचंड लांबीचा श्वेतसर्प’ असा करतात!

पण इथं केवळ ताबा मिळवून चालणार नव्हतं… तो टिकवणेही महत्त्वाचे होते. १९८४ मध्ये मात खाल्लेल्या पाकला इथं पोहोचायला त्यांच्या बाजूने केवळ काही तासच पुरू शकतात. भारताला मात्र इथवर पोहोचायला काही दिवस लागतात. सियाचीनवर लष्करी अस्तित्त्व टिकवून ठेवण्याचा आपला रोजचा खर्च आहे सुमारे सहा कोटी. पाकिस्तानला यामानाने अगदी कमी पैसे पडतात! त्यामुळे आपण एक क्षणही दुर्लक्ष केले की ते पुढे येण्याचा प्रयत्न करतात… टपून बसलेल्या कोल्हया-कुत्र्यांसारखे. अर्थात पाकिस्तानचे सैनिकही या प्रयत्नांत मोठ्या प्रमाणात दगावलेले आहेत… दोन्ही देशांचे मिळून सुमारे दोन-अडीच हजार लोक सियाचीनमध्ये दगावलेले आहेत!

सियाचीनमध्ये जगणे किती कठीण आहे, यावर शेकडो पानांचा प्रबंध लिहिता येईल. आणि याही स्थितीत तिथे लढणा-या आपल्या भारतीय सैनिकांपैकी एका आपल्याला अज्ञात असलेल्या एका सैन्याधिका-याची आणि एका जवानाची ही कथा… ३० एप्रिल, १९८९ रोजी सियाचीनवर घडलेली.

पाकिस्तानच्या हद्दीत त्यांनी उंचावर म्हणजे Point 6400 वर एक Observation Post (सैन्यचौकी) निर्माण केलेली होती. ६४०० ही तेथील त्या पर्वताची फुटांमधली उंची तिथून ते आपल्या सैन्यावर नजर ठेवून त्यांच्या तोफखान्यास सूचना देत गोळीबार करण्यास साहाय्य करीत. ही चौकी तिथून हटवल्याशिवाय आपला धोका कमी होणार नव्हता. इथं हल्ला करण्यासाठी साधनसामुग्री पोहोचवणे सोपे व्हावे म्हणून हेलिकॉप्टर उतरवण्यासाठी जागा तयार करणे गरजचे होते. या तयारीनिशी आपले २, डोग्रा रेजिमेंटचे वीस सैनिक वर निघाले. त्यांचे युवा अधिकारी कॅप्टन विजयंत कुमार यांना जिथे helipad बनवायचे होते, त्या जागेवर हेलिकॉप्टरच्या साहाय्याने उतरवण्यात आले… आपले सैनिक वर पोहोचेपर्यंत विजयंत साहेब तिथे एकटेच होते… त्या भयावह थंडीत. आणि वरून पाकिस्तानी सैन्याचा गोळीबार होण्याची अगदी खूपच शक्यता असतानाही! आपले सैनिक खालून रस्ता तयार करीत करीत वर चढत येत होते… जागोजागी दोर बांधावे लागतात… शिड्या लावाव्या लागतात! तापमान होते उणे ३५ पेक्षाही कमी. विजयंत साहेबांनी हेलीकॉप्टर साठी योग्य जागा शोधून ठेवली. आपले सैनिक तिथवर पोहोचले. ११ एप्रिल रोजी निघालेले हे दल तिथे चार दिवसांनी पोहोचले. आणि त्यांनी तिथे एक चौकी निर्माण केली… helipad तयार केले. आणि २१ एप्रिल रोजी तिथे हेलीकॉप्टर उतरवण्याचा प्राथमिक सराव करण्यात आला… यशस्वीरीत्या!

काहीच दिवसांत या ठिकाणी आपले सशक्त सैन्यचौकी कार्यान्वित झाली. इथल्या चौकीत एकावेळी केवळ चार सैनिक आणि एक अधिकारी राहू शकत एवढीच जागा होती. पाकिस्तान्यांच्या दृष्टीस ही गोष्ट पडणार नाही, असे शक्यच नव्हते. त्यांनी घाई-घाईत एक योजना आखली आणि आपल्या या चौकीवर हल्ला करण्यासाठी हेलीकॉप्टरला खाली दोरीला लटकावून एक अधिकारी आणि काही सैनिक इथवर पोहोचवण्याचा प्रयत्न केला. परंतू या भागात हेलीकॉप्टर उडवणे ही खूप कौशल्याची बाब असते. त्यांचे हेलीकॉप्टर हवेतच थांबले आणि खाली कोसळू लागले. त्यांनी दोर कापून त्यांच्या सैनिकांना नशीबाच्या भरवशावर सोडून ते निघून गेले! हे सैनिक नेमके पडले ते भारतीय चौकीच्या खालच्या बाजूला! ते खाली गेले असते तर आपल्या सैनिकांच्या टप्प्यात आले असते. त्यांनी एक रस्ता शोधला आणि त्यांनी एक योजन आखली… आपल्या या चार सैनिक असलेल्या चौकीवर खालून वर चढून येत अचानक हल्ला करायची!

या चार सैनिकांसाठी बर्फात खड्डे घेऊन खंदक तयार करण्यात आले होते. या खंदकावर रायफली ठेवून सैनिक उभे असत. या रायफली थंड पडू नयेत म्हणून पायांजवळ केरोसीनचा स्टोव्ह पेटता ठेवावा लागतो.. अन्यथा हत्यारे गोठून जातात… आणि फायरींग करू शकत नाहीत.!

चार सैनिक आणि एक अधिकारी अशी पाच जणांची तुकडी. दोघा सैनिकांनी दोन तास पहारा द्यायचा… तोवर इतर तिघे जण आराम करतील… असे आळीपाळीने करायचे अशी व्यवस्था होती.

सायंकाळची वेळ. कॅप्टन विजयंत कुमार साहेबांचा buddy अर्थात साहाय्यक सैनिक लान्स नायक प्रेम सिंग साहेबांशी गप्पा मारतो आहे… म्हणाला, ”साहेब, मला मुलगा झाल्याची बातमी कालच समजली! ” यावर विजयंत साहेबांनी त्याचे अभिनंदन केले… आणि इथून खाली गेल्यावर पार्टी करण्याचे निश्चित केले! तेवढ्यात शिपाई सरदार सिंग आणि लान्स नायक कमलेश्वर आपली पाळी संपवून चौकीत परत आले… सरदार सिंग यांनी आपल्या पायांतील बूट काहीवेळा उतरवले आणि तंबूतील स्टोवच्या उष्णतेवर ते पाय शेकू लागले! आता उरलेल्या दोघांना पहा-यावर जायचे होते! त्यानुसार प्रेमसिंगही पहा-यावर गेले… आणि त्यांनी शत्रूला पाहिले… दुश्मन… दुश्मन! अशी आरोळी दिली… सरदार सिंग हत्यार घेऊन अनवाणी पायानेच बाहेर धावले… आणि बर्फातून धावत जात त्यांनी चौकीवर चालून येणा-या शत्रूवर अचूक हल्ला चढवला… इकडे पहा-यावर नुकत्याच परतलेल्या प्रेमसिंग यांची गन अजून थंड असल्याने फायर होतच नव्हती… ते जबर जखमी झाले. सरदार सिंग यांनी प्रेम सिंग यांना तिथून उचलून मागे आणले… तंबूत ठेवले… आणि त्यांच्याकडची काडतुसे घेऊन पुन्हा बाहेर धाव घेतली… तीन दुश्मन उडवले… आणि त्याच प्रयत्नात खांद्यावर गोळी लागून जखमीही झाले.

इकडे एका क्षणात कॅप्टन विजयंत कुमार साहेबांनी कृती केली… चौकीत घुसले आणि तिथे असलेले rocket launcher हाती पेलले… आणि या चौघा-पाच जणांच्या दिशेने फायर केले… यावेळी शत्रूही गोळीबार करीत होता… पण कॅप्टन साहेबांनी त्याची पर्वा केली नाही!

Rocket launcher च्या एका गोळ्याने काम फत्ते केले… ते पाचही जण मागे फेकले गेले… आणि कुठे खाली दरीत गेले समजले नाही! याच दरम्यान आपले तिन्ही सैनिक खंदकात पोहोचले… त्यांनी तिथे गरम करण्यासाठी ठेवलेल्या हत्यारांचा वापर करण्यास सुरुवात केली… जोरदार गोळीबार सुरु केला… तिथले पहाड या आवाजांनी एकदम सावध झाले! एरव्ही तिथे इतर आवाज विरळाच असतात. हा आवाज अर्थातच इथून ५०० मीटर्स खाली असलेल्या सैन्य तुकडीने ऐकला होताच. त्यांना वाटले आपली ही चौकी गेली… कारण विजयंत साहेब खाली रेडीओ मेसेज देण्याच्या स्थितीत नव्हते… ते जिथून पाकिस्तानी सैनिक वर चढून आले होते त्यांच्या दिशेने सुमारे पाचशे मीटर्स पर्यंत चालत गेले होते. जाताना कमरेला दोर बांधून घेतला… कारण वाटेत कुठेही बर्फाचा चिंचोळा खड्डा असू शकतो… अंधार होता… त्यांनी खाली वाकून पाहिले तर तिथे दोर लावलेला होता… आणि तो दर हेलाकावे खात होता… अर्थात खालून आणखी काही सैनिक वर येण्याच्या प्रयत्नात होते! कॅप्टन साहेबांनी दोर कापून टाकला…!

इकडे चौकी आणखी एका बाजूने पाच पाकिस्तानी बर्फात सरपटत सरपटत हल्ला करण्यास पुढे सरसावले… आपली पहा-याची पाळी संपवून तंबूत माघारी आलेल्या शिपाई सरदार सिंग यांनी आपली चांगली तापलेली गन अचूक डागत त्यांना ठोकले!

इकडे खालून वर पाहणा-या आपल्या सैनिकांना वाटले की आपल्या चौकीवर हल्ला करून ती पाकने जिंकून घेतली आहे.. आणि आता ते आणखी मागे म्हणजे आपल्यापर्यंत येतील! त्यांनी जिथे कॅप्टन साहेबांनी rocket launcher डागले होते, त्या जागेचा संदर्भ घेत खालून तोफा डागण्याची तयारी केली होती… तेवढ्यात कॅप्टन साहेब तंबूत परतले… त्यांनी खाली रेडीओ मेसेज केला… हलो… विक्टर हिअर! आमचा 

खाली हा मेसेज ऐकणा-या अधिका-यांचा क्षणभर त्यांच्या आवाजावर विश्वासच बसला नाही… कारण त्यांनी त्या चौकीवर तीन बाजूंनी झालेला गोळीबार पाहिला होता!

सुदैवाने आपला गोळीबार सुरु होण्याआधीच कॅप्टन साहेबांनी संदेश पोहोचवला आणि मोठा अनर्थ टळला… कारण बोफोर्स तोफेचा गोळा जिथं पडतो त्या जवळचा कित्येक मीटर्सचा परिसर भाजून निघतो! यावेळी पाक तोफखानाही जागा झाला… आणि त्यांनी गोळे डागायला सुरुवात केली… आपल्या बोफोर्स या रात्री हजार वेळा कडाडल्या!

कॅप्टन विजयंत यांच्या तुकडीच्या जागी मग खालून नऊ सैनिक आणि एक अधिकारी अशी सुसज्ज तुकडी निघाली… परंतू तोफांच्या मां-यामुळे त्या परिसरातील बर्फाचे कडे पिचकले गेले होते… असाच एक मोठा हिमनग निसटला आणि त्यात आपले हे नऊ सैनिक आणि सुभेदार भागसिंग हुतात्मा झाले… त्यांचे देह ताब्यात येण्यास महिना-दीड महिना लागला… ही किंमत असते सियाचीनमधल्या लढाईची!

वर मदतीस येणारी दुसरी तुकडी येण्यास अजून अवकाश होता. विजयंत साहेब आणि त्यांचे चार सैनिक आता अधिकच सावध राहू लागले… झोप विसरली गेली. दोन तीन दिवस सतत खूप बर्फ पडले… पाच फूट उंचीचा बर्फ साठला… डोळ्यांच्या पापण्यांवर जर डोळ्यांतून येणा-या पाण्याचा थेंब थांबला… की त्याचे बर्फात रुपांतर होते… पापण्यांवरील ते गोठलेले बर्फ बोटांनी चुरा करून काढून टाकले तरच समोरचे दिसणार!

या दरम्यान या चौकीतील सर्वांनाच हिमबाधा झाली… तिघांची हातांची बोटे कापून काढावी लागली.. एक सैनिक हुतात्मा झाला… विजयंत साहेबांच्या पायांना जखमा झाल्या… त्या ब-या होण्यास खूप कालावधी जावा लागला!

सहा एप्रिल रोजी हवामान थोडे सुधारल्यावर कॅप्टन विजयंत आणि इतरांना खालच्या मुख्य तळावर आणण्यात आले. तेथे त्यांचे खूप जोशात स्वागत करण्यात आले! शिपाई सरदार सिंग आणि कॅप्टन विजयंत कुमार या दोघांनाही वीर चक्र सन्मान जाहीर करण्यात आला.

पाकिस्तानी चौकीला शह देण्यासाठी हाती घेतल्या गेलेल्या या सैन्य कारवाईला ऑपरेशन आयबक्स असे नाव दिले गेले होते. आयबक्स हा बर्फाळ प्रदेशात राहणारा मेंढासदृश प्राणी असून डोंगराच्या अगदी नव्वद अंशाच्या उभ्या भिंतीवर नीडरपणे चढून जाण्यासाठी हा प्राणी वाकबगार आहे.

पुढे या भागातून दोन्ही देशांनी मागे जावे असा करार झाला होता. पाकिस्तान करार पाळण्याच्या बाबतीत कुप्रसिद्ध असल्याने आपले सैन्य इथे चोवीस तास सज्ज असते!

कॅप्टन विजयंत कुमार यांना वीर चक्राने सन्मानित करण्यात आले. पण या मोहिमेदरम्यान गमावलेल्या दहा सैनिक आणि एका अधिका-याच्या आठवणी त्यांना आजही सतत भेडसावत असतात!

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “डकवले आणि पाठवले…” – लेखक / माहिती संग्राहक : अज्ञात ☆ प्रस्तुती – प्रभा हर्षे ☆

प्रभा हर्षे

? इंद्रधनुष्य ?

☆ “डकवले आणि पाठवले…” – लेखक / माहिती संग्राहक : अज्ञात  ☆ प्रस्तुती – प्रभा हर्षे ☆

दत्तात्रय लक्ष्मण पटवर्धन

 – – पहिल्या महायुद्धात बर्लिन शहरावर बॉम्ब टाकणाऱ्या कोकणी ब्राह्मणाची कहाणी

पहिला भारतीय वैमानिक म्हणजे दत्तात्रय लक्ष्मण पटवर्धन.. यांचा जन्म १० जुलै १८८३ रोजी रत्नागिरी येथे झाला. दत्तूया नावाने ओळखल्या जाणाऱ्या दत्तात्रयांचे शिक्षण पाचवी इयत्तेपर्यंतच झाले. परंतु त्यांच्या खोडकर व हट्टी स्वभावामुळे त्यांचे वडील लखूतात्या यांनी त्यांना घराबाहेर काढले.

दत्तूचे नामकरण

दत्तू चालत कोल्हापूरला गेले आणि तिथून विनातिकीट मुंबईला पोहोचले. तिथे त्यांनी ‘मस्जिद बंदर’ येथे सहा महिने रेल्वे हमाल म्हणून काम केले. त्यानंतर ते माटुंगा रेल्वे वर्कशॉपमध्ये ‘वायरमन’ म्हणून रुजू झाले आणि पुढे ‘इंजिन ड्रायव्हर’ बनले. नोकरी मिळवण्यासाठी त्यांनी आपले आडनाव बदलून ‘अँग्लो-इंडियन’ पद्धतीचे केले – ‘डी. लॅकमन पॅट’ (D. Lacman Pat) असे नामकरण केले. एके दिवशी अचानक, मुंबई बंदरात उभ्या असलेल्या ‘स्ट्रान्स फेल्स’ (Strance Fells) या जर्मन जहाजावर ते चढले आणि तपासणीच्या वेळी कोळशाच्या गोणीत लपून बसले. जहाज समुद्रात दूर गेल्यावर, त्यांनी जर्मन कॅप्टन हेन्रिक ज्योडेल यांची मनधरणी केली आणि वायरमन व इंजिन-देखभाल (maintenance) करण्याचे काम मिळवले. हेन्रिक त्यांना पासपोर्टशिवाय जर्मनीला घेऊन गेले आणि हॅम्बर्ग येथे त्यांना ‘मरीन इंजिनिअरिंग’चे प्रशिक्षण दिले. त्यानंतर दत्तू स्कॉटलंडला गेले आणि ‘ओशन किंग’ (Ocean King) या जहाजावर मरीन इंजिनिअर म्हणून रुजू झाले.

मरीन इंजिनिअर ते पायलट

१९११ मध्ये हे जहाज लिव्हरपूल आणि न्यूयॉर्क दरम्यान अनेकदा ये-जा करत असे. त्यांच्या इंजिनिअरिंगच्या कामावर खूश होऊन, १९१२ मध्ये त्यांना ‘तुकाराम’ या जहाजावर इंजिन बसवण्यासाठी मुंबईला पाठवण्यात आले. १९१४ मध्ये जेव्हा पहिले महायुद्ध सुरू झाले, तेव्हा दत्तू ब्रिटनच्या ‘वॉर ऑफिस’मध्ये (युद्ध कार्यालयात) गेले आणि त्यांनी ‘अँब्युलन्स कोअर’मध्ये (रुग्णवाहिका पथकात) काम मिळवले. त्यांची निष्ठा आणि प्रामाणिकपणा पाहून त्यांना ‘ससेक्स’ ब्रिगेडमध्ये ‘सैनिक’ म्हणून बढती देण्यात आली. तिथे त्यांना अत्याधुनिक शस्त्रे, बंदुका आणि तोफा चालवण्याचे प्रशिक्षण मिळाले. त्यानंतर त्यांना प्रत्यक्ष रणांगणावर लढण्यासाठी फ्रान्सला पाठवण्यात आले. पुढे त्यांची ‘रॉयल एअर फोर्स’मध्ये (हवाई दलात) निवड झाली. तिथे त्यांनी मालवाहू (कार्गो) आणि बॉम्बर विमाने चालवण्याचे कौशल्य आत्मसात केले आणि ते एक कुशल वैमानिक बनले. दाट धुक्याचा फायदा घेत दत्तू यांनी थेट बर्लिनवर बॉम्बफेक केली. शत्रूच्या ‘अँटी-एअरक्राफ्ट’ (विमानविरोधी) तोफांचा मारा चुकवत त्यांनी मोठी खळबळ उडवून दिली आणि थेट ‘कैझर पॅलेस’वर बॉम्ब टाकले. बर्लिनवर बॉम्बफेक करणारे जगातील पहिले ‘बॉम्बर पायलट’ म्हणून त्यांचा गौरव करण्यात आला. किंग जॉर्ज पाचवे यांनी स्वतः दत्तू यांच्या कोटावर लष्करी सन्मान आणि शौर्यपदक लावून त्यांचा गौरव केला. त्यांना ‘स्वर्ड ऑफ मिलिटरी ऑनर’ (लष्करी सन्मानाची तलवार) देऊन सन्मानित करण्यात आले.

पायलट दत्तूच्या आयुष्यातील भाग्यवान क्षण

या समारंभानंतर, दत्तू यांनी इंग्लंडच्या राजाला सांगितले की त्यांचे खरे नाव दत्तात्रय लक्ष्मण पटवर्धन आहे आणि ‘डी. लॅकमन पट’ (D. Lacman Pat) हे अँग्लो-इंडियन नाव धारण करूनच ते सैन्यात दाखल झाले होते. हे ऐकून राजाने अतिशय आनंदाने आणि कौतुकाने उद्गार काढले – “आमच्या हवाई दलात एक मर्द मराठा तरुण! ” आणि त्यांनी दत्तू यांच्यावर चुकीचे नाव धारण केल्याबद्दल (impersonation) कोणतीही कारवाई न करण्याचे आदेश दिले. ही घटना २४ एप्रिल १९१९ रोजी घडली. त्यांची ‘लेफ्टनंट’ या पदावर पदोन्नती झाली आणि त्यांना दरमहा बाराशे रुपये इतका भरघोस पगार मिळू लागला! दत्तू उत्स्फूर्तपणे उद्गारले – “हा माझ्या आयुष्यातील सर्वात भाग्यवान क्षण आहे! ” 

१९२१ मध्ये भारतात परत 

१९२१ मध्ये मुंबईच्या ब्रिटिश गव्हर्नरनी दत्तू यांना ‘शाही पाहुणे’ (Royal Guest) म्हणून आमंत्रित केले. दत्तू रत्नागिरीला परतले आणि त्यांनी अमरावतीच्या चंद्राताई शेवडे यांच्याशी विवाह केला. १९३० मध्ये ते निवृत्त झाले. त्यांच्या साहसी कामगिरीची माहिती २५ मार्च १९१९ रोजी ‘लंडन गॅझेट’मध्ये प्रकाशित झाली. लंडनची वर्तमानपत्रे आणि ‘ग्राफिक’ (Graphic) या नियतकालिकाने १३ मे १९१९ रोजी त्यांचे सविस्तर चरित्र प्रसिद्ध केले. प्रसिद्ध मराठी दैनिक ‘केसरी’नेही १३ मे १९१९ रोजी दत्तू यांच्या पराक्रमाचा सविस्तर वृत्तांत दिला. रत्नाकर शिवराम वाशीकर आणि अनंत लक्ष्मण मराठे यांनी लिहिलेले ‘इंडियाज फर्स्ट पायलट’ (India’s First Pilot) हे पुस्तक १८ ऑक्टोबर २००३ रोजी प्रकाशित झाले. दुसरे महायुद्ध (१९३९) – १९३९ मध्ये दुसरे महायुद्ध सुरू झाले आणि लंडनहून आलेल्या आदेशानुसार, दत्तू यांच्यावर दिल्ली येथे ‘ऑल इंडिया मिलिटरी, नेव्हल अँड एअर फोर्स अकादमी’ (सर्व-भारतीय लष्करी, नौदल आणि हवाई दल अकादमी) स्थापन करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली. दत्तू यांनी या अकादमीमध्ये अनेक भारतीयांना प्रशिक्षण दिले.

कर्करोगामुळे निधन

१८ ऑक्टोबर १९४३ रोजी कर्करोगामुळे दत्तू यांचे निधन झाले. त्यांची पत्नी आणि मुलगा नागपूर येथे स्थायिक झाले. त्यांचे नातू – प्रभाकर पटवर्धन हे मुंबईतील कांदिवली येथे आपला स्वतःचा अभियांत्रिकी व्यवसाय चालवत आहेत. जे. आर. डी. टाटा यांचा उल्लेख नेहमीच ‘भारताचे पहिले वैमानिक’ असा केला जातो. त्यांनी १९२७ मध्ये विमान चालवले होते; परंतु त्याआधीच, १९१४ मध्ये दत्तात्रय पटवर्धन यांनी ‘बॉम्बर पायलट’ (बॉम्बफेकी विमानाचे वैमानिक) म्हणून इतिहास घडवला होता. त्यामुळे, त्यांनाच ‘भारताचे पहिले वैमानिक’ म्हणून सन्मानित केले जाणे आवश्यक आहे.  

समस्त मराठी जनांना ही अभिमानास्पद गोष्ट आहे.

लेखक / माहिती संग्राहक : अज्ञात 

प्रस्तुती : प्रभा हर्षे 

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ इतके मला पुरे आहे… कवी : अज्ञात  ☆ प्रस्तुती : उषा नाईक ☆

उषा नाईक

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ इतके मला पुरे आहेकवी : अज्ञात  ☆ प्रस्तुती : उषा नाईक ☆

बसायला आरामखुर्ची आहे,

हातामध्ये पुस्तक आहे,

डोळ्यांवर चष्मा आहे,

इतके मला पुरे आहे. ।।१।।

 *

निसर्गामध्ये सौंदर्य आहे,

निळे आकाश, हिरवी झाडी आहे,

सूर्योदय, पाऊस, इंद्रधनुष्य आहे,

इतके मला पुरे आहे. ।।२।।

 *

जगामध्ये संगीत आहे,

स्वरांचे कलाकार आहेत,

कानांना सुरांची जाण आहे,

इतके मला पुरे आहे. ।।३।।

 *

बागांमध्ये फुले आहेत,

फुलांना सुवास आहे,

तो घ्यायला श्वास आहे,

इतके मला पुरे आहे. ।।४।।

 *

साधे, चवदार जेवण आहे,

सुमधुर फळे आहेत,

ती चाखायला रसना आहे,

इतके मला पुरे आहे. ।।५।।

 *

जवळचे मित्र आहेत,

मोबाईलवर संपर्कात आहेत,

कधीतरी भेटत असतात,

इतके मला पुरे आहे. ।।६।।

 *

डोक्यावरती छत आहे,

कष्टाचे दोन पैसे आहेत,

दोन वेळचे दोन घास आहेत,

इतके मला पुरे आहे. ।।७।।

 *

देहामध्ये प्राण आहे,

चालायला त्राण आहे,

शांत झोप लागत आहे,

इतके मला पुरे आहे. ।।८।।

 *

याहून जास्त आपल्याला काय हवे आहे?

जगातील चांगले घेण्याचा,

आनंदी, आशावादी राहण्याचा,

विवेक हवा आहे!

इतके मला पुरे आहे. ।।९।।

 *

विधात्याचे स्मरण आहे,

प्रार्थनेत मनःशांती आहे,

परमेश्वराची कृपा आहे,

इतके मला पुरे आहे. ।।१०।।

 *

शरीर माझे योग्य साथ देत आहे,

स्मृतीची मला साथ आहे,

मी कुणावरही आज अवलंबून नाही — ही देवाची कृपा आहे,

इतके मला पुरे आहे!

इतकेच मला पुरे आहे! ||११||

कवी – अज्ञात 

प्रस्तुती :  उषा नाईक

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ “ द अल्टिमेट इन्व्हेस्टर” – लेखक : आशिष मुळे ☆ परिचय – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

?पुस्तकावर बोलू काही?

☆ “ द अल्टिमेट इन्व्हेस्टर” – लेखक : आशिष मुळे ☆ परिचय – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

पुस्तक :  द अल्टिमेट इन्व्हेस्टर “…

गोष्ट जन्मजन्मांतरीची

जन्मजन्मांतरीच्या वैचारिक गुंतवणूकीची गोष्ट 

लेखक : आशिष मुळे 

प्रकाशक : मिहाना पब्लिकेशन्स, पुणे 

काही वर्षांपूर्वी अशी परिस्थिती होती की काही अवांतर वाचन करणे शक्य नव्हते. त्यानंतर वाचनासाठी वेळ उपलब्ध झाला. पण वाचायचे इतके राहिले होते की कुठून सुरुवात करावी हे समजानेसे झाले होते. त्यामुळे आवडीचा विषय–कविता– आणि त्यासंबंधीचे साहित्य वाचायला घेतले. पण बरेच वर्षे कादंबरी मात्र वाचनात आली नव्हती. आणि अचानकपणे एक नवी कोरी कादंबरी हातात आली. कादंबरीही नवीन आणि लेखकही नवीन. तरीही ती वाचण्याचा योग येईना. अखेर काही दिवसांपूर्वी वाचून झाली. मात्र मनाला एक गोष्ट पटेना. ती म्हणजे लेखकाची म्हणजे श्री. आशीष मुळे यांची ही पहिलीच कादंबरी आहे. एखाद्या अनुभवी लेखकाने कथानक गुंफत जावे, नवीन पात्रे त्यात वाढत जावीत, मूळ कथानकाशी एकरूप व्हावीत आणि कथानक अगदी शेवटपर्यंत उत्सुकता वाढवणारे होत जावे… ही भट्टी नव्या लेखकाला जमू शकते हे आशिष यांनी दाखवून दिले आहे. फक्त त्यासाठी संपूर्ण कथानकाचा आवाका आणि त्यातून व्यक्त करायचा असलेला आशय प्रथम लेखकाच्या मनात स्पष्ट असायला हवा. श्री आशिष मुळे यांना ते साधले आहे याबद्दल शंका नाही.

श्री आशिष मुळे

खरं तर ही एक कादंबरी नसून एकात एक गुंफलेल्या दोन कादंब-या आहेत. एकीकडे राघव आणि सायली, शिरीन यांची कथा आणि त्याच वेळेला हळूहळू फुलत जाणारी निम आणि नादिया यांची कथा. दोनही कथानकांना पोषक असे वातावरण, त्यानुसार पात्र निर्मिती आणि त्याला उचित ठरेल अशी भाषाशैली… त्यामुळे प्रत्येक प्रसंग डोळ्यासमोर उभा राहतो. शिवाय निसर्ग, शहरी वातावरण, हिमालयाचे वर्णन, संवादाची भाषा या बाबतीत अचूकता आहे आणि या सगळ्याला आध्यात्मिक विचारांची असलेली किनार! दोन्ही कथानकांमध्ये समतोल साधून मूळ सूत्र सुटू न देता कथानक वाचकाला शेवटपर्यंत खिळवून ठेवते.

आवश्यक त्या ठिकाणी गंभीरपणे व्यक्त केलेले विचार हे लेखकाच्या परिपक्व विचारांचे प्रतिबिंब आहे. उदाहरणार्थ, सागराला उद्देशून काढलेले उद्गार पहा :

“माणसाचा दुराभिमान आणि अहंकार क्षणात नाहीस करण्याचं आणि त्याच्या क्षुद्रपणाची जाणीव करून देण्याचं सामर्थ्य फक्त तुझ्यातच आहे “. किंवा

“आदमी बादशाह नहीं है, वक्त बादशाह है |” हे वाक्य.

तर दुसरीकडे, ‘ दारुडा माणूस सगळं विसरत असला तरी स्वतःच्या घरी व्यवस्थित कसा काय पोचतो? ” असा मजेशीर पण खरा प्रश्न त्यांना पडतो. पुढे बिलावाला यांच्या मृत्यूच्या प्रसंगी राघवच्या तोंडी आलेले

“मृत्यू थांबवण्याचं काम विज्ञान करु शकत असेल पण मृत्यू टाळण्याचं नाही. ” हे वाक्य आपल्याला नकळत एका सत्याची जाणीव करून देते. इनव्हेस्टसंबंधी ‘ बेसीक रुल ‘ राघवच्या तोंडून सांगताना लेखकाच्या अंगभूत व्यावसायिक विचारांची दिशा दिसून येते. तसेच अध्यात्माविषयी आचार्यांनी मांडलेले विचार हे लेखकाच्या अध्यात्म विषयक चिंतनाचे प्रकटीकरण आहे हे जाणवते.

कादंबरीच्या अगदी शेवटच्या टप्प्यात लेखकाने केलेले वर्णन, विवेचन, संवाद वाचल्यानंतर महाभारतातील पांडवांच्या अखेरच्या प्रवासाच्या वर्णनाची आठवण होते. या अखेरच्या लिखाणात दोन जन्मांची घातलेली

सांगड अत्यंत कठीण पण कौशल्यपूर्ण आहे. गुंतवणूक संबंधी असलेल्या आपल्या व्यवसायाचा प्रत्यक्ष अनुभव, चिंतनशीलतेची जोड, मातोश्रींकडून आलेले लेखनाचे कौशल्य, जगण्याकडे पाहण्याचा चौकटी पलीकडचा दृष्टिकोन या सर्वांच्या घुसळणीतून मिळालेले ‘ रिटर्नस’ म्हणजे *द अल्टिमेट इन्व्हेस्टर.. गोष्ट जन्मजन्मांतरीची*.. असे म्हणणे उचित ठरेल असे वाटते.

अशाच वैशिष्ट्यपूर्ण लेखनासाठी शुभेच्छा!

पुस्तक परिचय – श्री सुहास रघुनाथ पंडित

सांगली (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares