☆ मला समजलेली संत तुकारामांची गाथा… भाग – १३ ☆ सुश्री अरुणा मुल्हेरकर ☆
गाथेतून उमजणारी गीता(३)
अर्जुनाला रणभूमीवर माझ्याच नातेवाईकांना मी कसे मारू असा जेव्हा भ्रम झाला त्यावेळी, माता, पिता, बहीण, बंधू, भार्या, अपत्ये ही सर्व नाती कशी असत् आहेत, आणि मी- कृष्ण हेच कसे परब्रह्म आहे याचा उपदेश श्रीकृष्णाने गीतेत केला. त्याच परमतत्वानुसार
तुकाराम महाराज सर्व मोह पाशातून मुक्त झाले आहेत. म्हणून ते म्हणतात,
बाप मेला न कळता/ नव्हती संसाराची चिंता/
विठू तुझे माझे राज्य/ नाही दुसऱ्याचे काज/
बाईल मेली मुक्त झाली/ देवे माया सोडविली/
पोर मेले बरे झाले/ देवे माय विरहित केली/
माता मेली मज देखता/ तुका म्हणे हरली चिंता/
ज्या ज्या गोष्टी असत् आहेत, त्याचा विनाश अटळ आहे हे सत्य स्वीकारण्याची शक्ती जेव्हा अंगी येते, तेव्हाच सत् ची, परमतत्वाची, परब्रम्हाची ओळख पटते. त्याचवेळी जिवा शिवाचे ऐक्य होऊ शकते.
जोपर्यंत माणूस संसार बंधनात अडकून पडलेला आहे, तोपर्यंत त्याला संसाराचे भय असते. एकदा का त्याला संसार हा भासच आहे याची खात्री पटली की तो भव भयापासून मुक्त होतो. महाराज आता संसारातून पूर्णपणे निवृत्त झाले आहेत. त्यांना कसल्याही भोगाची आसक्ती राहिली नाही. म्हणून ते देवाजवळ बोलतात,
भोगावरी आम्ही घातला पाषाण/ मरणा मरण आणियेले/
विश्व तू व्यापक काय मी निराळा/ कशासाठी बळा येऊ आता/
काम सारुनिया काढावे बाहेरी/ आणूनी भितरी काय ठेवू/
तुका म्हणे काही नेणे लाभ हानी/ असेल तो धनी राखो वाडा/
मी गुणातीत आत्मा आहे. मला देह दुःख नाही अशा भूमिकेचा दगड भोगांच्या डोक्यावर ठेवून मी मरणाचा अंत केला आहे. देवा तू जर विश्वव्यापक असशील, तर मी त्यापेक्षा निराळा नाही. अशा परिस्थितीत मला वेगळेपणाचा खटाटोप करण्याची काय जरूर आहे? तू आणि मी एकच आहोत. लाभ किंवा हानीची परवा तू असताना मी का करावी? मी काही लाभ हानी जाणत नाही, जो या देहाचा धनी असेल तोच त्याचे रक्षण करेल.
याचसाठी तुकाराम महाराज त्यांच्या गाथेतून साधकांना विठ्ठलाच्या चिंतनाचे महत्त्व सांगतात.
काय नोहे केले/ एका चिंतीता विठ्ठले/
सर्व साधनांचे सार/ भवसिंधू उतरी पार/
योगयागतपे/ केला त्याने अमुपे/*
तुका म्हणे जपा/ मंत्र त्रीअक्षरी सोपा/
एका विठ्ठलाच्या चिंतनाने काय मिळत नाही? हा भव सिंधू पार करण्यासाठी विठ्ठल हा त्रि अक्षरी मंत्र पुरेसा आहे. योग, याग, साधना वगैरे गोष्टींची काहीही आवश्यकता नाही.
सर्वतोपरी देहाभिमान शून्य होणे म्हणजेच योग आणि तप आहे. तोच परमार्थ आहे. ज्यावेळी देहाभिमान नाहीसा होईल त्याचवेळी जन्ममृत्युरूपी येरझार थांबेल.
योग तप याची नावे/ गणित व्हावे अभिमाने/७
करणे ते हेचि कर/ सत्य बरा व्यापार/
तरी खंडे येरझार/ निधे भार देहाचा/
जेव्हा विषयसुख गोड वाटते, तेव्हा जन्ममृत्यूच्या फेऱ्यात सापडून किती यातना भोगाव्या लागतात याचे वर्णन महाराज त्यांच्या या अभंगात करतात.
विषयाचे सुख /येथे वाटे गोड/
पुढे अवघड/ यमदंड/
मारिती तोडिती/ जोडीतील निष्ठुर/
यमाचे किंकर/ बहु साल/
असिपत्र तरुवर/ खैराचे इंगळ/
निघतील ज्वाल/तैल पाकी/
तप्तभूमीवरी/ चालविती पायी/
अग्निस्तंभ बाही/ कवटाळविती/
म्हणूनी तुका येतो काकुळती/ पुरे यातायाती गर्भवास/
क्षणिक विषयसुखाचे भोगावे लागणारे परिणाम किती भयंकर आहेत याची कल्पना तुकारामांच्या या अभंगातून आपल्याला येते.
एका नामात हरी वसलेला आहे, परंतु आपल्यासारखी सामान्य माणसे देहातच सर्व सुख आहे असे मानतात व त्यामुळे परब्रम्हप्राप्ती आपल्यापासून दूर पळते.
देह हा सादर पहावा निश्चित/ सर्व सुख येथे नाम आहे.
आपल्याला मिळालेल्या देहाकडे आदराने जरूर पहावे, परंतु एक परब्रह्म, एक नामच सर्व सुखाचे साधन आहे.
लटक्या संसारात माणूस अडकतो. लोभ, मोह इत्यादी षड्रिपूंच्या जाळ्यात सापडतो. त्याला हरिनामाचा विसर पडतो. खूप पैसा जमवण्याची धडपड करतो. शेवटी या क्षणभंगुर देहाचा नाश होतो आणि बापाने ठेवलेल्या पैशांवरून दोन भावांचे आपसात भांडण लागते.
लटीकियाच्या आशा/ होतो पडिलो वळसा/
होऊनिया दोषा/ पात्र मिथ्या अभिमाने/
बारावी उघडली दृष्टी/ नाहीतरी होतो कष्टी/
आक्रंदते सृष्टी/ मात्र या चेष्टांनी/
मरणाची नाही शुद्धी/ लोभी प्रवर्तली बुद्धी/
परती तो कधी/ घोड्याची ना माघारी/
साचवुनी मरे धन/ लावी पोरांची भांडण/
नाही नारायण / तुका म्हणे स्मरला.
संसारी माणसाची अशी ही शोककथाच आहे.
आता हा पुढील अभंग पहा.
येथे नाही उरी आले अवतार/ येरे ते पामर जीव किती/
विषयाचे झणी व्हाल लोलिंगत/ जेवलीया अंत नलगे भंग/
वाहून या भार कुंथसील ओझे/ नवे तेचि माझे थीता त्याग/
तुका म्हणे कैसी नव्हे त्याची लाज/ संती केशी-राज साधियाला/
या अभंगात तुकाराम महाराज प्रापंचिकाला उपदेश करीत आहेत. या ठिकाणी अवतार हा शब्द नारायणाच्या मत्स्य, कुर्म आदी दशावतारांना उद्देशून आला आहे. त्यांचे म्हणणे असे आहे की जिथे हे अवतार सुद्धा राहिले नाहीत तिथे सामान्यांची काय कथा? विषयाची आसक्ती माणसाला कुठे नेईल त्याचा काही नेम नाही. जे खरोखर आपले नाही, त्याचे ओझे खांद्यावरून विनाकारण वाहून हे माणसा तू स्वतःला कष्ट देऊ नकोस. त्यामुळे स्वहिताचा त्याग होईल. केशव हाच परमात्मा आहे, त्याला साध्य करण्यातच स्वहित आहे.
स्वतः तुकाराम महाराज निःसंग होऊन अहोरात्र गोविंदाचे पोवाडे गात होतेच आणि लोकांनाही भवभयापासून मुक्त व्हावे यासाठी ते सावध करीत होते. विठ्ठलाचे नाव वाचेत असल्यामुळे विषयात अडकलेल्या तुकारामांना योग्य मार्ग सापडला. कृष्णाने अर्जुनाला गीतेत हेच सांगितले होते की तू कृष्ण भावना भावित होणे जरुरीचे आहे.
☆ # अरे विकास विकास… # ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर☆
“आवं दादा या पुलावरून हे काय धावतया म्हनायचं.. आनि तेबी जमिनीवर पाय न लावता असं अधांतरीचं कसं काय पळतया! … “
“अरे बाबानू असं का येड्यावानी इचारतायं? … ती धावती ना तिला या शहराची मेट्रो म्हनत्यात… ती अशीच तुमच्या आमच्या इतकचं काय मोठ्या इमारतीच्या डोक्यावरूनच पळत असती! … तिचा अन जमिनीचा काहीच संबंध येत नाही.. कायमच ती अशी अधांतरी पळत असती.. आताच्या दिवसात या शहराची हु दुसरी जीवनदायीनी हायं बाबानू.. समजलं! … “
… ” असं हायं का? पर अवं दादा पर सहा महिन्याच्या मागं या जागेवर जी झोपडपट्टी व्हती त्यात आम्ही चाळीस पन्नास वर्षं राहत व्हतो.. ते मराठवाड्यात दुष्काळी कामं सुरू झाली म्हणून आम्हाला संमद्याना तकडं काम मिळालं. तवा इकडं घराला कुलूप घालून आम्ही संमदी तकडं गेलो.. सहा महिनं म्हणता म्हणता एक वरीस ततच ठेवून कामं पूरं झाल्यावरच आम्हाला सोडलं… अन इथं येऊन बघतो तर ह्यो मोठा पूल बांधलेला दिसला.. ती पळणारी चकाचक रेल्वे दिसली पन आमच्या झोपड्या काय कुठं नदरलाच दिसनात… अन आमच्या आजुबाजूला राहणारे ते शेजारपाजारचे लोक बी दिसनात… पाक भुईसपाट करून खालनं दोन चार मोठ्ठं रस्तंच बांधलेलं दिसलं… किती मोटारींचा येजा चा गर्दा माप वाढलेलला दिसतूया.. “
“अरे बाबानू आता शहराचा मोठा विकास होऊन राहिलाय… ते सरकारनं स्मार्ट सिटी योजना अमंलात आणायचं ठरवलंय.. तेव्हा सगळ्यात पहिल्यांझुट गदा ही गलिच्छ झोपडपट्टीच्या जागेवर घालण्यात आलीयं… आता शहराचा विकास करताना काही गोष्टींचा त्याग करावा लागतो.. सरकारी वटहुकूम निघाला की सगळ्यांना त्याप्रमाणे वागावचं लागतं… त्येला काय इलाज नाही… आता तुमच्या झोपड्या गेल्या आहेत तर तुम्हाला दुसरीकडे जागा शोधायला हवी.. या भागातला समाजसेवका कडं जाऊन भेटा म्हणजे तो तुम्हाला मदत करील… “
“.. नगं नगं आता आम्ही कोणाला भेटाबिट्याच्या भानगडीत पडनार नाही बघा… तो काय शहराचा विकास हुनार आहे म्हनता तो तर हा असा आभाळालाच भिडायला गेल्या सारखाच डोक्याच्यावरनचं जाणारा हाय नव्हं… मगं आम्ही आमच्या झोपड्या पहिल्या होत्या तश्याच या पुलाच्या खाली प्रत्येक खांबाच्या भवतीनं बांधून राहतो.. नाही तरी त्या खांबाच्या बाजुची जमिनीचा काही आता विकास काय होणार नाही… मगं आम्हाला कोणी तिथून उठवणार पण नाही… ते म्युन्सिपालटीवालं साहेब आम्हाला चांगले वळखतात.. आन ते लै दयाळू बी हायती.. झोपडं बांधल्यावर एक डाव त्यांची गाठ घेऊन पानसुपारी केली कि लाईट पानी अन सुलभ शौचालयाची पन सोय लगेच करतात बघा… सरकारला म्हनावं काय तुझा विकासाचा ऊजेड पाडायचा तो वर आकाशापतूर नेऊन पाडनास.. आम्ही इथं भुईवर चटई पसरुन बघत राहतू… “
“अरं बाबानू या विकास करताना तुमच्या सारख्या गोरगरिबांचीच फारच अडचण होत होती… म्हणून तर तुम्हाला सरकारी कामं देतो, चांगला पैका देतो या आमिषावर ओढून च तिकडं मराठवाड्यात लांब नेलं आणि इकडं हा पूल पूर्ण होईपर्यंत तुम्हाला सोडलचं नाही… काय येतयं का लक्षात काही तुमच्या.. साप पण मेला आणि काठी पण वाचली अशी सरकारनं खेळी केली होती… हं आता तुम्हाला राहायला जागा नाही घर नाही तर तुम्ही तरी काय करणार म्हणा… या पुलाच्या खालच्या जागे शिवाय पर्याय आहे कुठे… शिवाय तुमचा तो म्युनिसिपालिटी चा साहेब आहेच कि तुमच्या मदतीला… नाहीतर त्याने त्याच्या नोकरीत न दिसणारा विकास आता नाही तर कधी करून घ्यायचा… “
“बरयं मी निघतो.. ती मेट्रो जशी धडधड करीत वरनं जाताना दिसली कि मलाही माझ्या छातीत धडधड वाढायला लागते… वयाचा परिणाम आहे बाबा… आकाशाला गवसणी घालणारा विकास बघूनच माझे डोळे दिपून गेले… आता या पुढे अधिक पाहण्याआधी ते लवकरच मिटलेले बरे… “
आणि त्या गावाहून आलेल्या गोरगरीबांनी मेट्रो पुलाच्या खाली खांबाच्या आधारे आपल्या झोपड्या उभा केल्या.. आकाशातून खाली पाहताना चकाचक श्रीमंतीचा थाट दिसत होता आणि त्याच्या सावलीत विसावलेली गरीबी मात्र घाबरून पुलाच्या खांबाला पाली सारखी चिकटून बसली होती…
(अपर्णाची जुळी मुलं मनूला फार फार आवडत आणि लाघवी अपर्णा अति माया करी मनूवर.
दिवस कसे पळत होते नुसते. अपर्णाचे मोहित रोहित आता आठ वर्षांचे झाले. अपर्णा संसारात बुडून गेली.)
– इथून पुढे – –
एक दिवस ती मनूला म्हणाली”मनू, माझ्याबरोबर तुझ्या कोणी चांगल्या डॉक्टर असल्या तर येशील का त्यांच्याकडे? ”
मनू म्हणाली “का ग अपर्णा? काही होतंय का तुला? ”अपर्णा म्हणाली मनू, मला छातीत गाठ वाटतेय. पण उगीच शंका नको म्हणून चांगल्या डॉक्टरला दाखवूया. मी अजून यांना पण बोलले नाहीये काही. ”
अपर्णा संकोचून म्हणाली.
मनूने त्याच आठवड्यात डॉ मोने यांची अपॉइंटमेंट घेतली. डॉ मंजिरी मोने मनूची खूप चांगली मैत्रीण होती. अपर्णा आणि मनू डॉ मोनेच्या क्लिनिकवर गेल्या. डॉक्टरांनी अपर्णाला नीट तपासलं.
त्यांनी मनूला सांगितलं आपण यांची बायॉप्सी करूया.
लगेचच त्यांनी छोटासा तुकडा घेतला आणि म्हणाल्या“ मी हा पॅथॉलॉजी ला पाठवते. घाबरू नको अपर्णा. ही गाठ साधी असण्याची शक्यता जास्त आहे. चार दिवसांनी रिपोर्ट मिळेल तुला”.
चार दिवसांनी पॅथॉलॉजी चा रिपोर्ट आला. , दुर्दैवाने ती गाठ malignant होती. मनूला अतिशय वाईट वाटलं.
अपर्णा शांत होती. तिची आई गावाकडून आली. अपर्णाचं mastectomy म्हणजे पूर्ण ब्रेस्ट काढून टाकायचं ऑपरेशन झालं. भास्कर आणि मनू चोवीस तास तिच्याजवळ होते.
अपर्णा दहा दिवसांनी घरी आली. नंतर केमो थेरपीचे चक्र सुरू झालं. सगळ्या केमो पार पडल्या
मनू ऑफिस मधून रोज अपर्णाकडे जाई. तिला छान खायला करून देई. गप्पा मारून तिचे मनोरंजन करी. अपर्णा बरी झाली. तिचे सगळे रिपोर्ट्स निगेटिव्ह आले. मनूला खूप आनंद झाला. अपर्णाची आई पुन्हा गावाला गेली.
मुलं आता बारा वर्षांची झाली.
अचानक अपर्णाला पुन्हा बरं नाहीसं व्हायला लागलं. अचानक वजन कमी व्हायला लागलं.
तिला पुन्हा डॉक्टरांकडे नेलं.
अपर्णाच्या कॅन्सरच्या सेकंडरीज आता सगळीकडे पसरल्या होत्या. मध्यंतरीची वर्षे इतकी चांगली गेली आणि अचानक या कॅन्सरने पुन्हा डोकं वर काढलं.
एम आर आय स्कॅन सगळं सगळं झालं. दुर्दैवाने हा कॅन्सर सगळीकडे पसरलेला दिसला. आता ओपन करण्यात काही अर्थ नव्हता.
बिचारी अपर्णा हळूहळू अंथरुणाला खिळली. फक्त वेदना शामक गोळ्या हेच औषध उरले तिच्यासाठी.
अपर्णा शांतपणे सहन करत निमूट पडलेली असे. मनूला तिचे हाल बघवत नसत. भास्कर सतत तिच्या जवळ बसलेला असायचा. मुलं कावरीबावरी होत. अपर्णा आता तर अंथरुणात न दिसण्याइतकी बारीक झाली होती.
कधी ती छान उत्साही असे तर कधी निराशेच्या आवर्तनात गुदमरून जाई.
मनूला विचारी”, मीच का ग मनू, मीच का? मला नाही ग मरायचं इतक्या तरुणपणी. जेमतेम चाळीशी ओलांडलीय मी. यांच्या कितीतरी अपेक्षा स्वप्नं आहेत ना. ती अर्धवट सोडून मी कशी जाऊ मनू? ”
मनूच्या डोळ्यांना धारा लागत.
“अपर्णा, होशील ग तू बरी. आता नवीन गोळ्यांनी तुला बघ छान वाटेल. ”मनू सांगायची. कधी बरे कधी खूप वाईट असे दिवस चालले होते.
आता घरी चोवीस तास ऑक्सिजन सिलिंडर आणून ठेवावा लागला. भास्करने ऑफिस मधून रजाच घेतली. अपर्णाच्या सासूबाई सतत सुनेजवळ बसत होत्या. मनू तर फक्त ऑफिसला जाण्यापुरतीच बाहेर असे. शेवट काय होणार हे सगळ्याना कळून चुकलं होतं.
त्या दिवशी अपर्णा खूप घाबरी झाली. तिला सतत ऑक्सिजन द्यावा लागला. ग्लानीत पडून राहिली अपर्णा.
दुसऱ्या दिवशी मनूने रजा घेतली आणि दिवसभर अपर्णा शेजारी बसून राहिली. अपर्णाने डोळे उघडले.
“मनू मला एक वचन देशील?
मी तर आता चालले. माझा हा संसार मी मधेच सोडून चाललेय. माझी मुलं अडनिड्या वयाची आहेत. नवरा तर फक्त पंचेचाळीस वर्षाचा. माझ्या भास्करशी लग्न करशील?
मला सगळं माहीत आहे ग, तुझं त्याच्यावर खूप प्रेम होतं. त्याने सांगितलं होतं मला. आम्ही एकमेकांपासून कधीही काही लपवलं नाही ग. मलाच वाईट वाटायचं की तुझ्यासारख्या गुणी मुलीला भास्करने का नकार दिला असेल? आणि मग माझ्यात होकार देताना त्याने काय पाहिलं असेल?
केवढं मोठं मन तुझं ग, हे सगळं विसरून तू माझ्यासारख्या सामान्य मुलीशी मैत्री केलीस. ”
अपर्णा दमून गेली. तिला धाप लागली. मनूने तिचा हात हातात घेतला. अपर्णाला झोप लागली हे बघून तिने हळूच तिला पांघरूण घातले आणि ती घरी आली.
आई ही मनूची सगळ्यात जवळची मैत्रीण.
“मनू, बरी आहे का ग अपर्णा? काय ग देव तरी. दृष्ट लागावी असा संसार करत होती पोर आणि हे काय ग अरिष्ट? ”मनूच्या आईच्या डोळ्यात पाणी आलं.
मनू, नक्की काय झालंय? तू अस्वस्थ का?
मनूच्या डोळ्यात पाणी आलं. तिने आईला अपर्णा म्हणाली ते सगळं सांगितलं.
आई म्हणाली, तू काय म्हणालीस मग तिला? ”
आई, तुला काय वाटतं, मी काय करावं? ”आई गप्प बसली.
“मनू, मला काही सुचत नाहीये ग. एकीकडे वाटतं तुझा संसार उभा रहावा, इतक्या उशिरा का होईना..
मनू शांत होती. ”आई मी अपर्णाला हो म्हणणार नाही. त्या जात्या जिवाला मी खोटे वचन नाही ग देणार.
आई, तुला सगळं माहीत आहे. मी भास्करवर मनापासून प्रेम केलं. पण तो मला कधीच आपलं म्हणाला नाही. त्याचं माझ्यावर कधीच प्रेम नव्हतं आणि नाही. ,
त्याच्या अपर्णाबरोबरच्या संसारात तो पूर्ण सुखी होता. मीसुद्धा मनोमन आनंदच मानला त्यांच्या सुखात. अपर्णा माझी खरोखर जिवलग मैत्रीण झाली.
ती म्हणाली मला, भास्कर पण तुझ्याशी लग्न करायला तयार आहे.
आई, पण मलाच आता त्याच्याशी लग्न नाही करावंसं वाटत.
माझं कोवळ्या वयातलं प्रेम त्याला नको होतं.
तो कधीही माझा नव्हता. मग आता हा निष्क्रीय संसार मी का करू? मला त्याच्यावर काही सूड नाही ग उगवायचा.
पण तूच सांग, वठलेल्या झाडाला पुन्हा तो कोवळा बहर येईल का?
मी खरोखर त्याला माझं मानलं पण असं जबरदस्तीनं थोडंच कोणी आपल्यावर प्रेम करतं का?
बरं मी तयार झालेही लग्न करायला जयशी.. तर त्या जयची आई मध्ये आली आणि लग्न मोडलं माझं. माझ्या नशीबातच लग्न नाहीये कदाचित.
आता जर मी भास्करशी लग्न केलं तर मला त्या संसारात जागोजागी अपर्णा दिसेल.
भास्कर तिला कसा विसरेल आई?
माझ्याशी लग्न ही एक तडजोड करणार आहे तो.
त्याचा अवेळी विस्कटलेला संसार सावरायला मी हवीय त्याला.
त्याचे गोड मुलगे मला मनू मावशी म्हणतात. एकदम मी त्यांच्या आईची जागा कशी घेऊ? पण मलाच हे काहीच नकोय.
मला सगळे नक्की स्वीकारतील.
ओळखीची मुलगी बरी हाही विचार तेही करतील.
भास्करसुद्धा ही तडजोड म्हणूनच करणार.
त्याच्या आयुष्यत फक्त अपर्णाच होती आणि रहाणार.
मी आता एक स्वतंत्र बाई झालेय.
मला आता ही तडजोड जमणार नाही आई.
खर बोलायचं तर मला त्याच्या संसारात तो देऊ करत असलेलं हे दुय्यम स्थान नकोय.
हे सेकंड बेस्ट म्हणतात तसं आहे. पहिलं नाही म्हणून दुसरं स्वीकारणं.
मी भास्करची कधीही प्रायॉरिटी नव्हते आणि नाही. अजूनही नाहीये.
मला नाही आता या दुय्यम स्थानावर जायचं. मला आता अपर्णाने सजवलेला तिचा संसार नको. मला तिची सतत आठवण येत राहील तिथे.
आई, मी अपर्णाला असं वचन देणार नाही.
ती गेल्यानंतर काय करायचं हा सर्वस्वी भास्कर आणि त्याच्या कुटुंबीयांचा प्रश्न आहे. तूच सांग. मी बरोबर करतेय ना? ”
मनू आईला मिठी मारून हुंदके देऊन रडायला लागली. आईने तिला जवळ घेतलं. आपल्या या अतिशय सद्गुणी मुलीसाठी आईला अत्यंत वाईट वाटलं. काय विचित्र योग असावेत या मुलीचे असं मनात आलं आईच्या.
बाळा, तुझं बरोबर आहे. तू मनाविरुद्ध नको लग्न करू भास्करशी.
एवढ्या मोठ्या पोस्टवर नोकरी करतेस तू मनू. पुन्हा या संसारात पडणं जर तुला मनापासून नको असलं तर नको पडू. तू जो निर्णय घेशील तो मला, बाबांना मान्यच असेल.
त्याच रात्री अपर्णा गेलीच.
मनूने तिला वचन देण्याचा किंवा न देण्याचा अवघड प्रश्न उभाच राहिला नाही.
☆ “जागतिक जल दिन – २२ मार्च…” ☆ श्री सुधीर करंदीकर ☆
जागतिक जल दिन हा २२ मार्चला असतो. हे निमित्त साधून आपल्याला हा दिवस अगदी रोज म्हणजे रोज साजरा करायचा आहे.
जलदेवता प्रसन्न असेल तर शरीर आणि मन स्वच्छ राहतं आणि रोग आणि आजार हे कायम लांब राहतात. जलदेवतेला प्रसन्न करण्याचा सोपा मार्ग म्हणजे पाणी वाया न घालवणे आणि पाण्याचा योग्य उपयोग करणे.
——–
सर्व सजीवांच्या अस्तित्वाचा एक महत्त्वाचा घटक म्हणजे पाणी. पाण्याचे महत्व आणि त्याची उपयुक्तता याविषयी जागरूक करण्याकरता जगभरात दरवर्षी २२ मार्च हा जागतिक जल दिन म्हणून साजरा केला जातो.
जगप्रसिद्ध जलतज्ञ डॉक्टर माधवराव चितळे यांनी जागतिक जल दिन साजरा करण्याची संकल्पना सर्वप्रथम जागतिक मंचासमोर मांडली आणि यूएनओ च्या सर्वसाधारण सभेने २२ मार्च १९९३ रोजी पहिला वर्ल्ड वॉटर डे साजरा केला.
आपण पाणी वाया घालवणं म्हणजे कुणालातरी तहानलेले ठेवणं, इतका सोपा आणि साधा विचार जर आपण प्रत्येकाने केला, तर कुठल्याही खेड्यात / गावात / शहरात पाणीटंचाईवर मात नक्कीच होऊ शकते. म्हणूनच म्हणतात पाणी वाया न घालवणे हे एक सोपं आणि साधं पुण्य मिळवण्याचं साधन आहे.
सर्वसाधारणपणे घराघरांमध्ये पाण्याचा वापर असा होतो – आंघोळ, टॉयलेट, भांडी घासणे, कपडे धुणे, वॉश बेसिन चा वापर, बाल्कनी मधल्या कुंड्यांना पाणी, बाल्कनी धुणे, कार स्कूटर धुणे, घराभोवती असलेल्या झाडांना पाणी घालणे, घरा भोवतीची फरशी धुणे, वगैरे वगैरे.
या प्रत्येक हालचालीचा प्रत्येकाने एक त्रयस्थ म्हणून जर आढावा घेतला, आणि सगळ्यांच्या आढाव्यांची गोळाबेरीज केली तर लक्षात येईल की आपण घरातला प्रत्येक जण जेवढे पाणी वापरतो त्यापैकी ८० ते ८५ टक्के पाणी हे वाया जात असते आणि फक्त १५ ते २० टक्के पाण्याचा खरा आणि आवश्यक वापर होत असतो. हे कसं काय ते आता बघू –
घरामध्ये काहीही वाया जाऊ नये याबद्दल घरातल्या स्त्रिया नेहमीच सजग असतात.
म्हणून विचार केला, घराघरांमध्ये पाणी कसे वाया जाते आणि ते कसे वाचवता येईल, याबद्दल मैत्रिणींना फोन करून त्यांचे विचार / अनुभव विचारावे.
काल दिवसभरात शाळेतल्या मैत्रिणी /कॉलेजमधल्या मैत्रिणी/ वाचक मैत्रिणी यांना भरपूर फोन केले.
त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीची गोळा बेरीज ही अशी –
१) आंघोळ / शॉवर – बहुतेक घरांमध्ये आंघोळ पूर्ण होईपर्यंत शॉवर सुरूच असतो. अंगाला साबण लावताना किंवा शरीर स्वच्छ करताना शॉवर नक्कीच बंद करू शकतो. किती पाणी वाया जात असते याचा अंदाज घ्या.
२) टॉयलेट – टॉयलेटला गेल्यानंतर फ्लश करणे नक्कीच गरजेचे असते. पण लघवीला गेल्यानंतर पूर्ण फ्लश टॅंक एवढ्या पाण्याची गरज नसते. आपण बाजूला नळाखाली छोटी बादली ठेवू शकतो आणि ते पाणी ओतू शकतो. किंवा ड्युएल सेटिंग चा फ्लश टॅंक घेऊ शकतो. एकदा थोडा खर्च होईल पण पाणी वाचवण्याचे पुण्य मिळेल. यामुळे जे पाणी वाचेल ते कल्पनेच्या बाहेरचे असणार आहे.
३) भांडी घासणे – भांडी घासताना नळ सुरूच असतो आणि पाणी वाहत असते. नको असेल तेव्हा नळ नक्कीच बंद करता येतो. भांडी धुताना मोठ्या भांड्यात जे पाणी जमा होते ते झाडाच्या कुंड्यांना नक्कीच घालता येते.
४) वॉशिंग मशीन मध्ये कपडे धुणे – आपण ऑटो सायकल सिलेक्ट करतो, कपडे टाकतो आणि मशीन सुरू करतो. कपडे थोडे असले तरी मशीन भरपूर पाणी घेते आणि ते सगळे गरजेचे नसते. कपडे बघून आपण low, minimum, medium वगैरे नक्कीच सिलेक्ट करू शकतो आणि पाणी वाचवू शकतो.
५) वॉश बेसिन चा वापर – सकाळी उठल्यावर दात घासण्याकरता, काही खाल्ल्या नंतर तोंड धुण्याकरता, चेहरा धुण्याकरता बहुतेक सगळ्याच घरांमध्ये बेसिन वापरले जाते. आपण बेसिन पाशी जातो नळ पूर्ण उघडतो आणि नंतर मग दात घासणे /चुळा भरणे / नाक स्वच्छ करणे/ घसा स्वच्छ करणे, हे सगळे आपण करतो आणि नंतर शेवटी नळ बंद करतो. आणि नळाची धार पूर्ण वेळ मोठी असते. म्हणजे ५ टक्क्याचा खरा वापर होतो आणि ९५ टक्के पाणी वाया जाते.
पाणी कसं वाचवता येईल – बेसिनच्या खाली एक कॉक असतो. तो पूर्ण बंद करायचा आणि अगदी थोडासा उघडायचा. आता बघा बेसनची धार अगदी बारीक होईल. हातावर पाणी घेऊन सगळ्या क्रिया करण्याकरता ही धार अगदी पुरेशी असते. बेसिन जवळ असताना डावा हात नळावर ठेवायचा, जेव्हा पाहिजे तेव्हा नळ सुरु आणि इतर वेळा बंद. बघा किती पाणी वाचेल. पाणी वाचवायचं म्हणून काहीही खाल्ल्यानंतर ८ – १० चूळा भरण्याचं मात्र टाळू नका.
(चुळा का भरायच्या याकरता माझा लेख वाचा – चूळा भरूया आणि निरोगी राहूया)
६) बाल्कनीतल्या कुंड्यांना पाणी- बाल्कनी मध्ये छोटी छोटी फुल झाडं, तुळस, गवती चहा, वगैरे लावण्याची बहुतेकांना आवड असते आणि ती छानच आहे. कुंडीतल्या झाडांना अगदी थोडं थोडं पाणी लागतं. बहुतेक जण आतल्या नळापासून एक पाईप आणतात आणि तो एका कुंडीत सोडतात. कुंडी भरून वाहायला लागली की दुसऱ्या कुंडीत..
ओव्हर फ्लो झालेले पाणी बऱ्याच सोसायटींमध्ये ग्राउंड लेव्हल ला चालण्याच्या पॅसेज मध्ये वाहतांना दिसते. आणि हे सगळे पाणी वाया जात असते.
७) बंगले वजा सोसायट्यांमध्ये झाडांना पाणी – बहुतेक जण पाईपनी सगळ्या झाडांना भरभरून पाणी देत असतात. आणि नंतर ते पाणी इतके जास्त होते की गेटमधून बाहेर पडून ते पाणी रस्त्यावर वाहायला लागते. काहीजण पाण्याच्या फवाऱ्याने आपल्या कंपाउंडचं गेट पण धुतात. काहीजण घरासमोरचा संपूर्ण रस्ता त्यावर पाणी मारून गारवा येण्याकरता पाण्याने ओला करतात.
८) कार / स्कूटर धुणे – बऱ्याच घरांमध्ये कार स्कूटर धुताना, पाण्याचा नळ पूर्ण उघडा असतो, आणि कार स्कूटर ची अक्षरशः धुलाई होत असते. पाण्याचा पाईप पंधरा एक मिनिट तरी सुरू असतो. जमिनीवर पाण्याचे लोट वाहत असतात. खरंतर कायमस्वरूपीच हे धुणे आपण टाळू शकतो किंवा अगदी प्रमाणात अधून मधून करू शकतो. गाडीची काच ओल्या फडक्याने पुसता येते आणि इतर भाग कोरड्या फडक्याने पण पुसता येतो.
९) घराभोवतीची फरशी धुणे – बहुतेक बंगल्यांमध्ये भोवतालची फरशी भरपूर पाण्याने धुणे हा रोजचा कार्यक्रम असतो. काही ठिकाणी फरशी वरचा पालापाचोळा पाण्याच्या प्रेशरने ढकलत ढकलत गेटच्या बाहेर ढकलतात. खरंतर फरशांची अशी धुलाई नक्कीच टाळायला पाहिजे. खराट्याने फरशी झाडली तरी स्वच्छ दिसते. आणि कचरा पण गोळा करता येतो
१०) आजकाल सगळीकडेच उंच उंच इमारती होत आहेत आणि छतावरती सोलर वॉटर हिटर असतात. खालच्या कुठल्याही मजल्यावरच्या लोकांनी जर बाथरूम मध्ये गरम पाण्याचा नळ सोडला तर आधी उभ्या पाईपलाईन मधे असलेले एक ते दीड बादली गार पाणी येते आणि नंतर गरम पाणी यायला सुरुवात होते. आधी आलेले गार पाणी बाथरूम मध्ये ओतले जाते. यावर काहीतरी टेक्निकल सोल्युशन काढणे नक्कीच गरजेचे आहे पाणी वाचवण्याकरता.
११) एका मैत्रिणी नी तिचा एक अनुभव सांगितला –
मैत्रीण : अरे, काल मी चक्क पाण्याशी बोलले.
मला काही अर्थ लागेना, म्हणून मी म्हणालो, बाईसाहेब सगळं ठीक आहे ना!
मैत्रीण : अरे खरं तेच सांगतेय. त्यादिवशी मी संध्याकाळी फिरायला वेगळ्या रस्त्याने गेले होते. दोन्ही बाजूला बंगले आणि मधून रस्ता. थोडं पुढे गेले आणि रस्त्यावर पाणी वाहत होतं. आपण पाण्याला जल देवता म्हणतो. त्यामुळे पाण्यावर पाय देऊन पलीकडे जाणे मनाला पटत नव्हते. म्हणून मी कुठे कोरडा भाग आहे का ते बघत होते. तेवढ्यात मला एक वेगळ्याच टोन मध्ये आवाज ऐकायला आला. मी इकडे तिकडे बघितले पण कोणीच नव्हतं. आणि लक्षात आलं की पाण्यामध्येच काहीतरी चेहरा दिसतोय आणि तिथून आवाज येतोय.
पाणी : मी पाणीच बोलतोय. तू या भागात पहिल्यांदाच आलेली दिसतेयस. पाण्यावर पाय देऊन जा काही हरकत नाही. आणि पुढे चालताना तुला बऱ्याच ठिकाणी पाण्यावर पाय ठेवून जावे लागणार आहे, कारण खूप ठिकाणी रस्त्यावर पाणी वाहत असणार. आणि हे रोजचेच आहे.
मैत्रीण : मी मागे फिरते आणि दुसरीकडून जाते
पाणी : अगं रस्त्यावर असे वाहायला आणि वाया जायला मला पण आवडत नाही. पावसाळ्यामध्ये सगळीकडे पाणीच पाणी असते त्यामुळे पर्यायच नसतो. आम्हाला तेव्हा रस्त्यावरून वाहावेच लागते. पण इतर वेळा गरजूंच्या तोंडचे पाणी काढून रस्त्यावर वाहणे मला पण पटत नाही. बट नो चॉईस.
मैत्रिणीने खाली वाकून पाण्याला नमस्कार केला आणि ती पुढे गेली.
पाणी कुठे कुठे वाया जाऊ शकते आणि ते कसे वाचवता येईल, याबद्दल मैत्रिणींनी त्यांची छान छान ऑब्झर्वेशन्स आणि उपाय मला कळवले त्याबद्दल त्यांना धन्यवाद. त्यांचे संकलन मी या लेखात केले आहे. हेतू हाच की सगळ्यांनी जर विचारपूर्वक पाण्याचा वापर केला तर पाणीटंचाई कुणालाही जाणवणार नाही, तहानलेले कोणीही राहणार नाही.
जागतिक जलदिन हा आपण सगळ्यांनी खरंतर रोजच अमलात आणायचा आहे. पावसाळा असो, हिवाळा असो किंवा उन्हाळा असो.
पाण्याला आपण जलदेवता म्हटलं तर आपण नक्कीच पाणी कुठेही आणि कधीही वाया घालवणार नाही. आणि पाण्याची टंचाई कधीच भासणार नाही.
डॉक्टर माधवराव चितळे यांच्या या संकल्पने करता त्यांचे खूप खूप आभार आपण सगळेजण मानूया.
पाण्याच्या पंपाचा ज्यांनी शोध लावला त्यांचे पण आपण आज आभार मानूया. त्यांच्या शोधामुळेच आज आपल्या घराघरात, उंच उंच मजल्यांवर लांब लांब अंतरावरून पाणी येत आहे. शोधणारे जनक आहेत –
French born inventor – Denis Papin.
ब्रह्मदेवांना पण आपण आजच्या दिवशी एक प्रार्थना नक्कीच करूया – कलियुग संपल्यानंतर तुम्ही जेव्हा नवीन सृष्टीची निर्मिती कराल तेव्हा समुद्राचे पाणी पण नदीच्या पाण्याप्रमाणेच गोड करावे. म्हणजे सगळीकडे भरपूर पाणी राहील. टंचाई कधीच भासणार नाही.
रोज सकाळी उठल्यानंतर पाणी पिताना जलदेवतेला नमस्कार करायचा, आणि मनात मनन करायचं की मी आज कुठल्याही प्रकारे पाणी वाया घालवणार नाही.
दोघेही तावातावाने गाडी जवळ आले. त्याने उजवीकडचे आणि तिने डावीकडचे दार जोरात उघडले. दोघेही एकमेकांशी रागारागाने बोलत होते. घरातून निघतानाच त्यांच्यात कुठल्यातरी कारणाने प्रचंड मतभेद होऊन वाद झालेला असणार. कोणीही मागे हटायला तयार नव्हतं. दोघांनीही सीट बेल्ट खसाखसा लावले. त्याने गाडी सुरू केली. त्याच्या मनातल्या रागामुळे गाडीही ‘घूमघूम” आवाज करतच सुरू झाली. अत्यंत वेगाने पार्किंग मधले वळण पार करून गाडी फाटकाबाहेर पडली.
खिडकीतून हे सारं पहात असताना माझा जीव कमालीचा धडधडत होता. इच्छित स्थळी पोहोचेपर्यंत गाडीत सुद्धा ही दोघं भांडतच राहतील का? त्यांचं भांडण विकोपाला गेले तर? त्याचा स्टीअरींग वरचा कंट्रोल गेला तर? समोरून येणारा एखादा जड ट्रक त्याला दिसला नाही तर? काय होईल या विचाराने मी मात्र घामाघूम झाले.
का भांडली असतील ही दोघं? काय बिनसलं असेल असं त्यांच्यात?
दोघेही करिअर माइंडेड तसेच आपापल्या क्षेत्रात यशस्वी. आर्थिक दृष्ट्या संपन्न. इतक्या लहान वयात या क्लास्ड सोसायटीत तीन बीएचकेचा त्यांचा फ्लॅट, गाडी, हाय फाय जगणं. यश, कीर्ती पैसा सारं काही. भांडणाचा नक्की विषय काय असेल? त्याला मुल हवं असेल. हिला नको असेल. जबाबदारी कोणी निभावायची? वेळ कोणाकडेच नाही मग “मीच का? ” असा प्रश्न उपस्थित झाला असेल मग त्यातून दोघांचे पराकोटीचे इगोज!
किंवा तिला प्रमोशन मिळालं असेल, नव्या संधी तिच्यापुढे आरतीचं ताट घेऊन उभ्या असतील. पुन्हा एकदा अंतस्थ धुमसणारा द्वेष, मत्सर, चढाओढ. जोडीदाराचे यश पचवण्यासाठीचं मानसिक औदार्य नसणं वगैरे वगैरे किंवा असं असेल का? त्याचे वृद्ध आई-वडील, ती एकुलती एक म्हणून तिच्यावर असलेली तिच्या आई-वडिलांची नैतिक जबाबदारी, शिवाय तिच्याकडून अपेक्षित असलेल्या सामाजिक रीती परंपरेचं ओझं? मग त्यात पुन्हा “मीच का? ” या प्रश्नानं डोकं बाहेर काढणं?
दिवसभर खिडकीतून पाहिलेल्या भांडत जाणाऱ्या या सुंदर तरुण जोडप्याचा विचार मी करत बसले. स्वतःला त्यांच्या वादांची कारण शोधण्यात गुंतवून घेतलं आणि शिणवूनही घेतलं. लगेच मला माझ्या ज्येष्ठ असण्याचा अधिकार वाटू लागला. आज कालची पिढी म्हणजे अक्रस्ताळीच, डोक्यात राग घालणारीच. “एक घाव दोन तुकडे” नात्यांची तोडमोड क्षणात करणारे. यांना कुणीतरी मोठेपणाच्या नात्याने समजावले पाहिजे, “अरे! संसार म्हणजे तडजोड. एकमेकांना समजून घेणं. घ्यावी लागते माघार कधीतरी आणि घ्यावी की, थोडी वाट पाहावी, शब्दांचे विखारी बाण एकमेकांवर त्वरित सोडण्यापेक्षा मौन बाळगावं, थंडपणे समस्येची उकल करावी. ” बोलेन मी त्यांच्याशी.
संध्याकाळपर्यंत हीच टकटक माझ्या डोक्यात.
मोकळी हवा येण्यासाठी पुन्हा बंद खिडकी उघडली. तिन्ही सांजा उतरल्या होत्या. लोक घराकडे परतत होते आणि मी चकित होऊन पहातच राहिले. सकाळची ती भांडणारी दोघं आता मात्र हसत खेळत गाडीतून उतरली. भरपूर शॉपिंग केलेलं असावं. एकमेकांच्या हातातलं सामान दिलं घेतलं आणि हातात हात घालून, हवेचे मंद झोके अनुभवत थट्टा मस्करी करत ते लिफ्टपाशी गेले.
माझ्या मात्र दिवस विनाकारण खराब गेला होता पण आता या क्षणी मनातून मीही विसावलेच होते की! मनातल्या मनात त्यांच्या सुखी सहजीवनासाठी मी प्रार्थनाही करून टाकली.
भक्तीच्या या तीन प्रकारांपैकी आधी सांगितलेले प्रकार हे नंतरच्या प्रकारांपेक्षा उत्तरोत्तर जास्त कल्याणकारी आहेत.
विवेचन:
तामस गुणी भक्ति, राजस गुणी भक्ति आणि सात्विक भक्ति याबद्दल आपण मागील सूत्रात थोडा विचार केलेला आहे. तरी आपण काही मुद्दे पाहू.
तमोगुणी साधकाची भक्ति सकाम असते. तो अर्थार्थी असतो. प्रपंच आणि प्रपंचातील वस्तूंच्या भोगांचे त्याला आकर्षण असते. अनेक सुखसुविधा अर्थात उत्तम भोग भोगता यावेत म्हणून तो ईश्वराकडे वळतो.
रजोगुणी भक्तास प्रपंच आणि परमार्थ दोन्ही पाहिजे असतात. प्रपंचातील आणि परमार्थ मार्गातील विविध अनुभवांनी त्याची थोडी तयारी झालेली असते. जग नश्वर आहे, त्यातील सूखे खऱ्या अर्थांनी आपल्याला समाधान देऊ शकणार नाहीत याची अल्पशी अनुभूती त्याला आलेली असते. त्यामुळे भगवंत जसा ठेवेल तसे राहण्याचा प्रयत्न तो करीत असतो.
सत्वगुणी साधकाची भक्ति निष्काम असते. त्याला भगवंत प्राप्तीची ओढ लागलेली असते.
असा भक्त जरी प्रपंचात रहात असला तरी त्याची प्रपंचाची आसक्ती सुटलेली असते, परिणामी त्याची अंगी खरे वैराग्य येते.
याचा थोडा वेगळा विचार केला तर या तीन पायऱ्या आहेत असे आपल्या लक्षात येईल.
१. जागे होणे म्हणजे जीवनाचे ध्येय निश्चित करणे.
२. ध्येय प्राप्तीसाठी कार्य करणे. त्यासाठी आवश्यक गोष्टींचा अंगिकार आणि त्याज्य गोष्टींचा बहिष्कार. इथे साधकाला आपल्या दोषांची जाणीव होते.
३. साधक आपले दोष नाहीसे करण्याचा प्रयत्न करू लागतो.
आपला देश कृषीप्रधान आहे. वरील तीन गोष्टी करणे म्हणजे शेतातील तण, खराब गवत आणि कचरा बाहेर काढून टाकणं. यातून शेताची अर्थात मनरूपी शेताची मशागत होऊन त्यातून चित्त शुद्ध होऊ लागते. चित्तशुद्धी होणे हा परमार्थ मार्गातील महत्त्वाचा टप्पा मानला जातो. गौणी भक्तीतून साधक मुख्य भक्तीकडे जाऊ लागतो, त्याची साधना हळूहळू उच्च पातळीवर जाऊ लागते…!
जय जय रघुवीर समर्थ
—
नारद भक्ति सूत्रे ५८
“अन्यस्मात् सौलभ्यं भक्तौ ||५८||”
अर्थ : इतर मार्गांपेक्षा भक्तीमार्ग जास्त सुलभ आहे.
विवेचन:
भगवंत प्राप्तीच्या इतर मार्गांपेक्षा भक्तीमार्ग अधिक सुलभ आहे असे सर्व संत आपल्याला सांगतात. याचा विचार आपण या आधी पंचविसाव्या सूत्रात केलेला आहे. या सूत्रात आपण भक्तिमार्गाचे सोपेपण अर्थात सुलभता पाहणार आहोत.
योगमार्गात मनुष्याला अनेक गोष्टी अत्यंतिक काटेकोरपणे कराव्या लागतात. कारण त्या मार्गात तसेच विधिविधान आहे असे आपल्या लक्षात येईल. योगमार्गात आधी शरीरावर ताबा मिळवून मग मनावर ताबा मिळवावा लागतो. त्यासाठी त्याला युक्त आहार विहार करावा लागतो. भगवंत गीतेत म्हणतात – –
“निजणे जागणे खाणे फिरणे आणि कार्य हि |
मोजूनि करितो त्यास योग हा दुःख नाशन||”
(गीताई ०६. १७)
सध्याच्या काळात आहार, विहार आणि यथायोग्य झोप घ्यायला मिळणे शक्य आहे असे म्हणणे धाडसाचे ठरेल. त्यामुळे सामान्य साधकाला योगमार्ग कठीण ठरू शकतो.
आधी कथन केल्याप्रमाणे मनुष्य कर्म सुद्धा योग म्हणून करू शकतोच असे नाही. तर तो बरेच वेळा करून टाकत असतो, उरकत असतो. अशी कर्म करून मुक्ति मिळू शकेल का? अर्थात सामान्य मनुष्याला, साधकाला कर्म करणे साधू शकते, पण *कर्मयोग* साधणे मात्र जिकिरीचे ठरते.
ज्ञान मार्ग हा बुद्धीचा मार्ग आहे. याची सुरुवात साधन चतुष्ट्याने होते. साधक वैराग्यशील असावा लागतो. अनेक ग्रंथाचा अभ्यास करावा लागतो. तो अभ्यास अंगी मुरावा लागतो. इतके सगळे करून ज्ञानप्राप्ती झाली तर त्याचा अभिमान होण्याची शक्यता जास्त असते, असे सर्व संत सांगतात. सर्व संत सांगतात की भगवंताला अहंकार बिल्कुल चालत नाही.
भक्तीमार्ग हा सर्व सामान्य माणसांसाठी अगदी राजमार्गासारखा आहे. या मार्गाला अर्थात भक्तीला राजविद्या असेही म्हणतात. विद्या, संपत्ती, कुळ, वर्णाश्रम, वेदाध्ययन, कठोर तपश्चर्या इत्यादींची भक्तीला अपेक्षा नाही.
सर्वसामान्य मनुष्य आपल्या जवळच्या नातेवाइकांवर, आपल्या आवडत्या वस्तूंवर प्रेम करीत असतो. ते प्रेम कधी स्वार्थी असते तर कधी निःस्वार्थी. प्रेम म्हणजे काय हे दाखवता येत नसले तरी त्या प्रेमाची अनुभूती कमीअधिक प्रमाणात प्रत्येकाने घेतलेली असते. हेच प्रेम भगवंताकडे वळवले की त्याचे भक्तित रूपांतर होते.
संत तुकाराम महाराज या प्रेमाने भगवंत कसा जवळ येतो याचे वर्णन पुढील अभंगात करतात. — –
*”प्रेमसूत्र दोरी । नेतो तिकडे जातों हरी ॥१॥मनेंसहित वाचा काया । अवघें दिलें पंढरीराया ॥२॥ सत्ता सकळ तया हातीं । माझी कींव काकुलती ॥३॥ तुका म्हणे ठेवी तैसें । आम्ही राहों त्याचे इच्छे ॥४॥”*
(अभंग क्रमांक 432, सार्थ तुकाराम गाथा, धार्मिक प्रकाशन संस्था)
जय जय रघुवीर समर्थ
– – –
नारद भक्ति सूत्रे ५९
“प्रमाणान्तरस्यानपेक्षत्वात् स्वयं प्रमाणत्वात् (च) ||”
अर्थ : भक्ति कोणत्याही प्रमाणावर म्हणजे पुराव्यावर अवलंबून नाही तर ती स्वतः सिद्ध आहे, म्हणून ती इतर मार्गांपेक्षा सोपी आहे.
विवेचन : कर्मयोग, ज्ञानयोग यांच्याशी तुलना करताना नारद मुनी २६ व्या आणि ३० व्या सूत्रांत याचा उल्लेख केला आहे. त्यामध्ये भक्ति स्वयं फलप्रभा आहे असे म्हटले आहे. अर्थात तिला कोणतेही प्रमाण देण्याची गरज नाही.
प्रमा म्हणजे ज्ञान. ज्यामुळे ज्ञान होते, ते प्रमाण. प्रमाणा मध्ये ज्ञानाचा उगम होतो. भारतीय तर्कशास्त्रात तीन प्रमाण मानली गेली आहेत.
१. प्रत्यक्ष
२. अनुमान
३. शब्द किंवा आप्तवाक्य
इंद्रियांना अनुभवाला येणाऱ्या ज्ञानाला प्रत्यक्ष म्हणतात. (Perception)
निरीक्षणावर आधारित निष्कर्ष काढणे म्हणजे अनुमान.
ज्याच्यावर आपला विश्वास आहे, जो आपला हितचिंतक आहे, निःस्वार्थी आहे, त्याचे म्हणणं आपण मान्य करतो. खरे मानतो, ते आप्त वाक्य.
परमार्थ मार्गात जर कर्ममार्ग, ज्ञानयोग अथवा योगमार्गाने जायचे असेल त्यासाठी किमान त्या त्या विषयाचे प्राविण्य अथवा पात्रता (अर्हता) अंगी येणे गरजेचे ठरते.
याउलट भक्तिमार्गात कसलीच लौकिक पात्रता लागत नाही. अनेक संत निरक्षर होते, अनेक संत श्रीमंत होते, अनेक संत अतिशय गरीब होते, काही संतांनी एका नामस्मरणाशिवाय कोणतेही साधन केलेलं नाही. भक्त प्रल्हाद राक्षस कुळात जन्माला आला, अनेक स्त्री संत आहेत. रामाच्या प्रमुख भक्तांपैकी विभीषण राक्षस, हनुमंत वानर तर शबरी वनवासी होती, पण तिघांनी आपापल्या परीने भक्ति करून रामाची प्राप्ती करून घेतली. रामाने तर हनुमतांचा भरतासारखा भाऊ म्हणून गौरव केला.
ज्याप्रमाणे मातेला आपल्या वात्सल्याचे प्रमाण देण्याची गरज वाटतं नाही, त्याप्रमाणे भक्ताला आपल्या भक्तीचे प्रमाण देण्याची गरज वाटतं नाही.
जय जय रघुवीर समर्थ
– – –
नारद भक्ति सूत्रे ६०
“शान्तिरूपात् परमानंदरूपाच्च ||६०||”
अर्थ : भक्तीमध्ये स्वभावतः शांति असल्याने आणि ती अपार आनंद रूप असल्यामुळे ती इतर साधनांपेक्षा सुलभ आहे.
विवेचन : सर्वसामान्य मनुष्य आपल्या आयुष्यात कधी प्रयत्नाने तर कधी प्रारब्धाने अनेक गोष्टी मिळवतो. पण मनःशांती मिळवणं त्याला जमतेच असे नाही.
बालपणी त्याला नवनवीन खेळणी मिळाली की सुखशांती मिळेल असे वाटते, थोडा मोठा झाला की त्याला रंगीबेरंगी कपडे, चैनीच्या वस्तू मिळाल्या की सुखशांती मिळेल असे वाटते, मग ही मालिका संपता संपत नाही आणि मनुष्याला शांती लाभत नाही…
“अनुदिनी अनुतापें तापलो…! “ अशी त्याची स्थिती होऊन जाते. याचा अनुभव जवळजवळ प्रत्येकाने कमीअधिक प्रमाणात नक्की घेतला असेल.
साधक भक्तिमार्गात लागला की मात्र त्याला शांतीचा लाभ होऊ लागतो. “जितकी भक्ति तितकी प्राप्ति” या न्यायाने तो जितका भक्ति मध्ये रमतो, तितका तो मनाने शांती अनुभवू लागतो. भक्ति म्हणजे शीतगृह असे म्हटले तरी वावगे होऊ नये. तिथे गेले की कोणी कसाही असो, त्याला शांती मिळाल्याशिवाय रहात नाही. भक्तिसाधना दृढ होऊ लागली की साधक निःशंक आणि निर्धास्त होऊ लागतो. आपली काळजी घेणारे, आपल्याला खंबीर आधार देणारे आपले सद्गुरू आहेत, याची त्याला खात्री पटते. साधनेच्या पुढील पडावात त्याच्या लक्षात येते की सर्व काही भगवंतच करतो. आपल्या हातात काहीच नाही आणि भगवंत माझ्या भल्या साठीच सर्व काही करीत आहे, अशी त्याची धारणा होऊ लागते. त्यामुळे तो तटस्थपणे भगवंताची लिला पाहू लागतो. मग त्याचा आनंद, त्याचे समाधान, त्याची शांती कधीही भंग पावत नाही. संत तुकाराम महाराज याचे वर्णन पुढील अभंगात करतात.
आनंदाचे डोही आनंदतरंग |
आनंदचि अंग आनंदाचे || धृ. ||
*
काय सांगों जालें कांहीचियाबाई
पुढें चाली नाहीं आवडीनें || १ ||
*
गर्भाचे आवडी मातेचा डोहळा |
तेथिचा जिव्हाळा तेथें बिंबे || ३ ||
*
तुका म्हणे तैसा ओतलासे ठसा |
अनुभव सरिसा मुखा आला || ४ ||
(अभंग क्रमांक २५८२, सार्थ तुकाराम गाथा धार्मिक प्रकाशन संस्था)
☆ “‘वाघनख’ – –NOM DE GUERRE!” ☆ श्री संभाजी बबन गायके ☆
कर्नल विश्वासराव शिंदे
दैत्य हिरण्यकश्यपला मारायला नृसिंह अवतारात देवाला हातांच्या बोटांच्या नखांचा वापर करावा लागला… असाच एक राक्षस कलियुगात जन्माला आला होता… यावेळी त्याने ‘अफझल’ म्हणजे ‘श्रेष्ठ(? )’ असं नाव धारण केलं होतं! कलियुगातल्या नृसिंहानेही अर्थात स्वराज्य संस्थापक छत्रपती श्री शिवाजी महाराज साहेबांनीही नखांनीच अफझलची आतडी बाहेर काढून त्याला यमसदनी धाडले! फक्त ही नखं महाराजांच्या हातांच्या बोटांची नव्हती… बोटांमध्ये अंगठीसारखी घातलेली… धातूची होती! माजलेल्या अफजलचं पोट फाडायला मानवी नखं पुरेशी ठरली नसती… म्हणूनच धातूच्या वाघनखांची योजना महाराजांनी केली होती! हे छोटंसं शस्त्र डोंगराएवढा शत्रू मातीत घालायला पुरेसे ठरले होते!
वर्ष १९८५. भारतीय सैन्यात मराठा लाईट इन्फंट्रीची २१वी बटालियन उभारण्यात आली… भारतीय सैन्यातील विविध रेजिमेंटस, बटालियन्सचा विचार करता ही बटालियन तशी ‘तरुण’ किंवा नवी कोरी म्हणावी अशी होती. सीमापारचे शत्रू तर आहेतच, परंतू देशांतर्गत शत्रू सुद्धा काही कमी नाहीत. उत्तर-पूर्वेकडे देशाला विशिष्ट असा शेजार लाभलेला आहे. विघटनवादी शक्ती या देशांच्या सीमावर्ती भागांत तसेच त्यांच्या सीमांत लपून भारताविरोधात सशस्त्र कारवाया करीत असतात.
घनदाट जंगले, हिंस्र श्वापदे, विषारी कीटक, सततचा पाऊस यांची पर्वा न करता या भागांत आपल्या सैनिकांना काम करावे लागते. इथं समोरासमोरची लढाई लढली जाऊच शकत नाही. इथं आवश्यकता आहे गनिमी काव्याची… गुरील्ला पद्धत! गनिम-ई-कावा म्हणजे शत्रूचे हुलकावणी देणारे युद्ध आणि गुर म्हणजे युद्ध आणि ईला म्हणजे छोटे… छोटे युद्ध! यामागे कमी संख्येत, अचानकपणे प्रकट होत मोठ्या सैन्यावर वायुवेगाने हल्ला करून निघून जाणे, अशी पद्धत असते. आणि हीच पद्धत श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या युद्धनीतीचा प्रमुख भाग होती, असं दिसून येतं.
१९९०. उत्तर भारतात वाढता विघटनवाद लक्षात घेऊन खास उत्तर-पूर्वी राज्यांसाठी असं स्वतंत्र दल उभारण्याची गरज भासली. त्यावेळी लेफ्टनंट जनरल विजय ओबेराय (सेवानिवृत्त) त्यावेळी मराठा लाईट इन्फंट्रीचे कर्नल होते आणि त्यांच्याकडे एक बटालियन स्पेशल फोर्स म्हणून प्रशिक्षित करण्याचे दायित्व दिले गेले… त्यांनी २१वी बटालियन निवडली!
गुरील्ला पद्धतीच्या युद्धासाठी सैनिकांना विशिष्ट प्रकारचे प्रशिक्षण देणे अनिवार्य असते. म्हणून प्रशिक्षणाचा स्तर अत्युच्च ठेवावा लागतो. या दलाचे नावच स्पेशल फोर्सेस अर्थात विशेष सामर्थ्य असणारी दले असे आहे. भारतीय सैन्यात शिपाई म्हणून भरती होणे हीच मोठी कठीण बाब असते. स्पेशल फोर्सेस मध्ये या भरती झालेल्या, प्रशिक्षित सैनिकांनाच सहभागी करून घेतले जाते. विविध रेजिमेंटस, बटालियन्स मधील सैनिक आणि अधिकारी या दलांत प्रवेश करण्यासाठी स्वयंप्रेरणेने येतात… कारण यांत निवड म्हणजे एक मोठा बहुमान समजला जातो!
प्रशिक्षण कालावधी तीन ते पाच महिन्यांचा असू शकतो. यात पहिले पस्तीस दिवस सततचे शारीरिक प्रशिक्षण, डोळ्यांवर पट्टी बांधून एकत्रित येऊन कवायती करणे इ. चा समावेश तर असतोच. त्याचबरोबर स्वयंपाक करणे, संदेशवहन प्रशिक्षण, इमारती उध्वस्त करणे, तातडीचे वैद्यकीय सहाय्य देणे, अंधारातून, पाण्यातून, जंगलातून रस्ते शोधणे, आणीबाणीच्या स्थितीत अन्न, पाणी शोधणे, विषारी प्राणी हाताळणे आणि शस्त्रे चालवणे. चार चार दिवस पिण्याच्या पाण्याशिवाय राहणे, एक लिटर पाण्यावर तीन दिवस काढणे, सात सात दिवस न झोपता काम करीत राहणे! पाठीवर किमान दहा किलो वजन बाळगणे तर नेहमीचे. चालणे तर असतेच परंतू संपूर्ण युद्धसामग्री घेऊन दहा ते चाळीस किलोमीटर्स चालणेसुद्धा नेहमीचे. विविध भाषा गरजेनुसार शिकवल्या जातात. सैन्यात भरती होताना आणि पुढे प्रत्यक्ष सेवेत खडतर आयुष्य जगत असलेले सैनिकही या प्रशिक्षण सोडून जाण्याचे प्रमाण मोठे असते. प्रशिक्षणाच्या या टप्प्यावर प्रशिक्षण सोडून जाण्याचे प्रमाण सुमारे वीस टक्के असते.
पंचेचाळीसाव्या दिवसापासून आणखी कठीण टप्पा येतो. छत्तीस तास सतत व्यायाम, कसरत करणे, शत्रूच्या प्रदेशात घुसणे तिथून बाहेर पडणे याचा सराव, तीस किलोचे युद्धसाहित्य, चाळीस किलोचे इतर साहित्य घेऊन चालणे दहा किलोमीटर्स वेगाने चालणे, चाळीस ते पंच्याऐंशी किलो वजनाच्या जड वस्तू हलवणे, इकडून तिकडे घेऊन जाणे, पाण्यात बुडी मारून राहणे शिकवताना हात पाय बांधले जातात, पाण्यासंबंधी प्रशिक्षणात पहिल्या सोळा तासांत पिण्यासाठी पाण्याचा एक थेंब किंवा अन्नाचा एक कण दिला जात नाही. आणि या अवस्थेत स्मरण शक्ती, निरीक्षण शक्तीची परीक्षा घेतली जाते. हे झाल्यावर पुन्हा दहा किलोमीटर्स चालणे, सहा तास व्यायाम करणे, शत्रूवर छापा घालणे, जंगलात वास्तव्याची तयारी करणे, जखमी सैनिकांना संकटातून घेऊन येणे इत्यादी इत्यादी गोष्टी सर्वसाधारणपणे शिकवल्या जातात.
५६व्या दिवशी, सतरा किलो वजन घेऊन १०० किलोमीटर्स अंतर चालणे… यासाठी तेरा ते पंधरा तासांचा वेळ लागू शकतो… शिवाय इतर आणखीही प्रशिक्षणे असतात… प्रत्येक मिनिट आणि मिनिट शिकत राहावे लागते… आणि शेवटी अतिरेकी विरोधी कारवाईचे आव्हानात्मक प्रशिक्षण दिले जाते. वाळवंट, बर्फाळ प्रदेश, जंगली प्रदेश, पर्वतीय प्रदेश यांमधील कारवायांसाठी स्वतंत्र प्रशिक्षण कार्यक्रम असतातच. शिवाय विमानातून उडी घेत शत्रू प्रदेशात शस्त्रे घेऊन उतरणे हा भागही असतोच…
एवढे सर्व केल्यावरच Maroon Berete प्राप्त होते… काचेच्या पेल्यातील पेय पिऊन झाल्यावर त्या प्याल्याचा तुकडा चाऊन खाल्ला की प्रशिक्षण पूर्ण केले असे समजले जाते. आणि मगच स्पेशल फोर्सेसचा लढवय्या तयार होतो! परंतू सर्वांत महत्वाची बाब म्हणजे स्वत:ची ओळख लपवून म्हणजे जवळजवळ अदृश्य राहूनच या योद्ध्यांना कामगिरी करावी लागते… They don’t exist so that we can! अर्थात इतरांसाठी ते अस्तित्वात नसतातच. पण त्यांचे हे अस्तित्वात नसणे हे देशातील नागरीकांच्या अस्तित्वात राहण्यासाठी असते!
२१ मराठा चे रुपांतर स्पेशल फोर्समध्ये करण्याचे ठरल्यावर निवड चाचणी झाली. सुमारे दोनशे सैनिक आणि काही अधिकारी स्वयंस्फूर्तीने पुढे आले. यांपैकी केवळ १७ टक्के लोकच प्रशिक्षणात टिकले! विशेष बाब म्हणून इतरांना दुसरी संधी देण्यात आली… तरीही हे प्रमाण पंचवीस टक्क्यांच्या वर जाऊ शकले नाही… इतके प्रशिक्षण जबर होते!
२१ मराठा मध्ये त्यावेळी लेफ्ट. कर्नल राजीव परमार नावाचे अनुभवी उप-प्रमुख अधिकारी कार्यरत होते. चाळीस वर्षे वय असलेले परमार साहेब पदोन्नती घेऊन इतर बटालियन, रेजिमेंटमध्ये जाऊ शकले असते… पण जिथे माझे सैनिक तिथेच मी असेन या दृढ संकल्पामुळे परमार साहेबांनी स्पेशल फोर्समध्ये स्वयंप्रेरणेने नाव नोंदवले… प्रशिक्षणात पद आणि अनुभव याचा विचार न करता सर्वांना समान प्रशिक्षण घ्यावे लागते… या कठीण प्रशिक्षणादरम्यान परमार साहेबांना मृत्यूने गाठले!
२१ मराठाचे स्पेशल फोर्सेस दलात रुपांतर करण्याच्या प्रक्रियेची संपूर्ण जबाबदारी रत्नागिरीतल्या मोरावणे गावात जन्मलेल्या कर्नल विश्वासराव भास्करराव शिंदे साहेबांच्या समर्थ खांद्यांवर देण्यात आली. कर्नल शिंदे यांच्या रूपाने त्यांच्या घरातील ही पाचवी पिढी सैन्यात कार्यरत होती. त्यांचे वडील श्री. भास्करराव शिंदे Bombay Sappers मध्ये होते किंबहुना त्यांनीच Bombay Sappersची ४११, Para Field Company उभारली होती!
कर्नल विश्वासराव शिंदे साहेबांनी पुण्याच्या वाडिया महाविद्यालयातून पदवी घेऊन पुढे Indian Military Academy, देहरादून येथे सैन्याधिकारी प्रशिक्षणास प्रवेश मिळवला व त्यातून ते १९७२ मध्ये मराठा लाईट इन्फंट्रीच्या १४व्या बटालियनमध्ये सेकंड लेफ्टनंट म्हणून रुजू झाले होते. सध्या सेवानिवृत्त असलेल्या शिंदे साहेबांनी वयाच्या ६८व्या वर्षी विमानातून १५०० फुटावरून parachute jump करून दाखवली होती. अशा अनेक कामगिरी त्यांच्या नावावर आहेत. विविध पदांवर सेवा बजावलेल्या कर्नल शिंदे साहेबांनी महाराष्ट्र पोलिसांच्या विशेष दलास प्रशिक्षण देण्याची जबाबदारी अत्यंत प्रभावीरीत्या पार पाडलेली आहे!
२१ मराठा बटालियन स्पेशल फोर्स मध्ये रुपांतरीत करण्यासाठी शिंदे साहेबांनी पूर्ण ताकदीनिशी काम केले… आणि सामान्य जवानांतून विशेष योद्धे निर्माण केले.. आणि या शेकडो जवानांनी, अधिका-यांनी मणिपूर, म्यानमार सीमा इत्यादी ठिकाणी अनेक बलिदाने देत जबरदस्त कामगिरी करून दाखवली आहे. भारतीय सैनिकांवर भ्याड हल्ला करून त्यांची हत्या करून म्यानमारमध्ये लपून बसलेल्या अतिरेक्यांचा शोध घेऊन म्यानमार मध्ये घुसून त्यांना संपवण्याची कामगिरी या फोर्सने २०१५ मध्ये केली होती… Surgical Strike नावाने ही मोहीम प्रसिद्ध आहे. एखादा टोकदार भाला जसा अजिबात आवाज न करता थेट, अचूकपणे लक्ष्य भेदतो… यात चूक करण्याची सुतराम संधी नसते… त्याला Silent Spear म्हणतात… म्हणूनच या २१ स्पेशल फोर्सळा Silent Spear असंही म्हणतात. २०२३ पर्यंत सुमारे ३३ जवान, अधिकारी यांनी या प्रदेशात बलिदान दिले असून तीन कीर्ती चक्रे, १७ शौर्य चक्रे, ५४ सेना मेडल्स, १९५ उत्कृष्ट कामगिरी प्रशस्तीपत्रके अशी कमाई केलेली आहे. होय, शौर्यासाठी मिळवलेली पदके, पारितोषिके मोठ्या अभिमानाने सांगितली जातात… पण यासाठी प्राणांचे बलिदानही द्यावे लागते!
देशासाठी बलिदान देणारे हुतात्मा कर्नल संतोष महाडिक हे याच दलाचे अधिकारी होते. प्रसिद्ध सैन्याधिकारी ब्रिगेडीअर सौरभ सिंग शेखावत (निवृत्त) यांनी शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनात मोठी कामगिरी करून दाखवल्याचे सर्वश्रुत आहेच!
भारतीय सैन्यातील या स्पेशल फोर्सेस वेगवेगळ्या टोपणनावांनी (moniker) ओळखल्या जातात, त्यांची स्वत:ची परिचय-चिन्हे आहेत. Red Devils, Predators, Russel’s Vipers, Mighty Daggers, Pirates, Mountain Rats, Desert Scorpions, Vipers, Dirty Dozens अशी ही विविध नावे आहेत… याला Nom De Guerre असं संबोधन आहे. म्हणजे युद्धातलं नाव. २१ मराठा बटालियनच्या स्पेशल फोर्सचं असं नाव देण्याची वेळ आली तेंव्हा कर्नल विश्वासराव शिंदे साहेबांनी एक मराठी, आगळंवेगळं आणि अत्यंत अभिमानास्पद नाव सुचवलं… वाघनख!
जय हिंद! जय हिंद की सेना!
माहिती संकलक व लेखक : संभाजी बबन गायके.
पुणे
9881298260
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ “मनाच्या सवयी” – लेखक – अज्ञात☆ प्रस्तुती – श्री अनिल वामोरकर ☆
Instant Gratification – संयम हरवलेल मन
काल एका देवळाच्या रांगेत दर्शनाला भाविक उभे होते, तेव्हा एक माणूस रांगेत पुढे उभारण्यासाठी व लगेच दर्शन घेण्यासाठी वाद घालत होता, हे पाहून हे लक्षात आले की आपल्या सगळ्यांना सगळ्या गोष्टी लगेच हव्या असतात.
आज, आता, ताबडतोब!
जेवण हवं तर instant noodles.
मनोरंजन हवं तर ३० सेकंदाची reel.
खरेदी हवी तर one day delivery.
खेळ हवा आहे तर झटपट निकाल.
आणि यशही हवं ते overnight success!
थांबणं, वाट पाहणं, एखादी गोष्ट हळूहळू घडू देणं —
ही सवय जणू आपल्या सर्वांच्या आयुष्यातून हरवत चालली आहे.
मानसशास्त्रात यालाच म्हणतात Instant Gratification —
म्हणजे ताबडतोब सुख मिळवण्याची सवय.
रस्त्यावर सिग्नल लागतो. तीस सेकंदही झाले नसतात आणि मागून हॉर्न वाजायला सुरुवात होते. जणू त्या तीस सेकंदांवरच आयुष्याचं भविष्य ठरणार आहे.
इंटरनेट थोडं slow झालं की चिडचिड. फूड डिलिव्हरी दहा मिनिटं उशिरा आली की राग.
आजचं मन जणू एका विचित्र मोडमध्ये जगत आहे —
“आत्ता… लगेच… instant. ”
या सवयीचा परिणाम फक्त आपल्या वागण्यात दिसतो, पण तो आपल्या मेंदूतुन आणि मनातून तयार होतो.
जेव्हा आपल्याला लगेच आनंद मिळतो — मोबाईल notification, reel, likes, instant fast food — तेव्हा मेंदूमध्ये dopamine नावाचं रसायन वाढतं. हे dopamine मेंदूला सांगतं — “हे पुन्हा कर… यात मजा आहे. ” म्हणून आपण पुन्हा मोबाईल उघडतो, पुन्हा reels पाहतो, पुन्हा पटकन आनंद देणाऱ्या गोष्टी करतो.
हळूहळू मेंदूला सवय लागते जलद आनंदाची.
मग जे काम वेळ घेणारं आहे — अभ्यास, व्यायाम, नातं टिकवणं, करिअर घडवणं — त्यात मन टिकत नाही. कारण तिथे instant reward नसतो.
एका अर्थाने आजचा मेंदू जणू reel-training सारखा क्षणिक आनंदाचा गुलाम झाला आहे.
३० सेकंदात excitement.
पण आयुष्य reel नसतं…
तो full चित्रपट असतो.
आणि समजायला, जगायला, अनुभवायला
फक्त संयम लागतो.
मनशांतीचा उगमही संयमातून होतो.
अधीर मन धारदार असतं. टोचणारं, बोचणारं आणि मानसिक समाधानाचे तुकडे करणारं.
एका रोपट्याला झाड व्हायला वर्षं लागतात. पण आपण रोज मुळं उपटून पाहिलं — “वाढलं का? ” तर ते झाड कधीच वाढणार नाही.
पण आज आपण आयुष्याबरोबरही हेच करत आहोत.
थोडा संघर्ष आला की हार.
थोडं नातं कठीण झालं की दूर.
थोडा वेळ लागला की निराशा.
कारण मनाला संयमाची सवय उरलेली नाही.
खरं तर आयुष्यातील मोठ्या गोष्टी instant मिळत नाहीत. विश्वास तयार व्हायला वेळ लागतो. नातं मजबूत व्हायला वेळ लागतो. यश घडायला वर्षं लागतात.
आजच्या जगात वेग सगळ्यांकडे आहे. पण संयम फार थोड्यांकडे आहे. जग फास्ट झालंय, असं सर्वांना वाटतंय, पण पृथ्वी त्याच संयमी वेगाने फिरतेय. निसर्गचक्र तसेच आहे. माणसाने मोहाच्या पाठी गती बदलली आहे बस!
संयमी राहणं ही अचानक येणारी गोष्ट नाही; ती हळूहळू तयार होणारी सवय आहे. कधी कधी उतावळेपणा वाटला तर थोडा विराम घ्यायला शिका. लगेच प्रतिक्रिया देण्याऐवजी काही क्षण शांत राहा. प्रक्रियेवर विश्वास ठेवा — कारण मोठ्या गोष्टींना वेळ लागतो. मोबाईलपासून कधी कधी थोडं अंतर ठेवा — कारण instant आनंदाची सर्वात मोठी सवय आज मोबाईल लावतो.
कारण संयम म्हणजे फक्त थांबणं नाही…
तर योग्य वेळी गोष्टी होतील यावर विश्वास ठेवून थांबणं आहे.
संत होणं कदाचित कठीण असेल…
पण संयमाने शांत राहणं ही प्रत्येकाला शिकता येणारी कला आहे.
कारण आयुष्यात झाडावरील आनंदाची फुलं instant फुलत नाहीत तर ती
संयमानेच फुलतात आणि समाधान, आत्मशांतीचा सुगंध सर्वत्र वाटतात.
लेखक : अज्ञात
प्रस्तुती – श्री अनिल वामोरकर
अमरावती
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
(श्री संजय भारद्वाज जी – एक गंभीर व्यक्तित्व । जितना गहन अध्ययन उतना ही गंभीर लेखन। शब्दशिल्प इतना अद्भुत कि उनका पठन ही शब्दों – वाक्यों का आत्मसात हो जाना है।साहित्य उतना ही गंभीर है जितना उनका चिंतन और उतना ही उनका स्वभाव। संभवतः ये सभी शब्द आपस में संयोग रखते हैं और जीवन के अनुभव हमारे व्यक्तित्व पर अमिट छाप छोड़ जाते हैं। हम आपको प्रति रविवार उनके साप्ताहिक स्तम्भ – संजय उवाच शीर्षक के अंतर्गत उनकी चुनिन्दा रचनाएँ आप तक पहुँचा रहे हैं। सप्ताह के अन्य दिवसों पर आप उनके मनन चिंतन को संजय दृष्टि के अंतर्गत पढ़ सकते हैं।)
संजय दृष्टि – रामनवमी विशेष – राम, राम-सा..!
राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे,
सहस्त्रनामतत्तुल्यं राम नाम वरानने।
राम मर्यादापुरुषोत्तम हैं, लोकहितकारी हैं। राम एकमेवाद्वितीय हैं। राम राम-सा ही हैं, अन्य कोई उपमा उन्हें परिभाषित नहीं कर सकती।
विशेष बात यह कि अनन्य होकर भी राम सहज हैं, अतुल्य होकर भी राम सरल हैं, अद्वितीय होकर भी राम हरेक को उपलब्ध हैं। डाकू रत्नाकर ने मरा-मरा जपना शुरू किया और राम-राम तक आ पहुँचा। व्यक्ति जब सत्य भाव और करुण स्वर से मरा-मरा जपने लगे तो उसके भीतर करुणासागर राम आलोकित होने लगते हैं।
राम का शाब्दिक अर्थ हृदय में रमण करने वाला है। रत्नाकर का अपने हृदय के राम से साक्षात्कार हुआ और जगत के पटल पर महर्षि वाल्मीकि का अवतरण हुआ। राम का विस्तार शब्दातीत है। यह विस्तार लोक के कण-कण तक पहुँचता है और राम अलौकिक हो उठते हैं। कहा गया है, ‘रमते कणे कणे, इति राम:’.. जो कण-कण में रमता है, वह राम है।
राम ने मनुष्य की देह धारण की। मनुष्य जीवन के सारे किंतु, परंतु, यद्यपि, तथापि, अरे, पर, अथवा उन पर भी लागू थे। फिर भी वे पुराण पुरुष सिद्ध हुए।
वस्तुतः इस सिद्ध यात्रा को समझने के लिए उस सर्वसमावेशकता को समझना होगा जो राम के व्यक्तित्व में थी। राम अपने पिता के जेष्ठ पुत्र थे। सिंहासन के लिए अपने भाइयों, पिता और निकट-सम्बंधियों की हत्या की घटनाओं से संसार का इतिहास रक्तरंजित है। इस इतिहास में राम ऐसे अमृतपुत्र के रूप में उभरते हैं जो पिता द्वारा दिये वचन का पालन करने के लिए राज्याभिषेक से ठीक पहले राजपाट छोड़कर चौदह वर्ष के लिए वनवास स्वीकार कर लेता है। यह अनन्य है, अतुल्य है, यही राम हैं।
भाई के रूप में भरत, लक्ष्मण और शत्रुघ्न के लिए राघव अद्वितीय सिद्ध हुए। उनके भ्रातृप्रेम का अनूठा प्रसंग हनुमन्नाष्टक में वर्णित है। मेघनाद की शक्ति से मूर्च्छित हुए लक्ष्मण की चेतना लौटने पर हनुमान जी ने पूछा, ‘हे लक्ष्मण, शक्ति के प्रहार से बहुत वेदना हुई होगी..!’ लक्ष्मण बोले, “नहीं महावीर, मुझे तो केवल घाव हुआ, वेदना तो भाई राम को हुई होगी..!’
यह वह समय था जब समाज में बहु पत्नी का चलन था। विशेषकर राज परिवारों में तो राजाओं की अनेक पत्नियाँ होना सामान्य बात थी। ऐसे समय में अवध का राजकुमार, भावी सम्राट एक पत्नीव्रत का आजीवन पालन करे, यह विलक्ष्ण है।
शूर्पनखा का प्रकरण हो या पार्वती जी द्वारा सीता मैया का वेश धारण कर उनकी परीक्षा लेने का प्रसंग, श्रीराम की महनीय शुद्धता 24 टंच सोने से भी आगे रही। सीता जी के रूप में पार्वती जी को देखते ही श्रीराम ने हाथ जोड़े और पूछा, “माता आप अकेली वन में विचरण क्यों कर रही हैं और भोलेनाथ कहाँ हैं? “
इसी तरह हनुमान जी के साथ स्वामी भाव न रखते हुए भ्रातृ भाव रखना, राम के चरित्र को उत्तुंग करता है- ‘तुम मम प्रिय भरतहि सम भाई।’
समाज के सभी वर्गों को साथ लेकर चलना राम के व्यक्तित्व से सीखा जा सकता है। उनकी सेना में वानर, रीछ, सभी सम्मिलित हैं। गिद्धराज जटायु हों, वनवासी माता शबरी हों, नाविक केवट हो, निषादराज गुह अथवा अपने शरीर से रेत झाड़कर सेतु बनाने में सहायता करनेवाली गिलहरी, सबको सम्यक दृष्टि से देखने वाला यह रामत्व केवल राम के पास ही हो सकता था। संदेश स्पष्ट है, जो तुम्हारे भीतर बसता है, वही सामने वाले के भीतर भी रमता है।…रमते कणे कणे…! कण कण में राम को राम ने देखा, राम ने जिया।
राजस्थान में अभिवादन के लिए ‘राम राम-सा’ कहा जाता है। लोक के इस संबोधन में एक संदेश छिपा है। राम-सा केवल राम ही हो सकते हैं। सात्विकता से सुवासित जब कोई ऐसा सर्वगुणसम्पन्न हो कि उसकी तुलना किसी से न की जा सके, अपने जैसा एकमेव आप हो तो राम से श्रीराम होने की यात्रा पूरी हो जाती है। यही राम नाम का महत्व है, राम नाम की गाथा है और रामनाम का अविराम भी है।
राम राम रघुनंदन राम राम,
राम-राम भरताग्रज राम राम।
राम-राम रणकर्कश राम राम,
राम राम शरणम् भव राम राम।।
श्रीरामनवमी की बधाई। त्योहार पारंपरिक पद्धति से मनाएँ, सपरिवार मनाएँ ताकि आनेवाली पीढ़ी सांस्कृतिक-आध्यात्मिक मूल्यों के रिक्थ से समृद्ध रहे।
अध्यक्ष– हिंदी आंदोलन परिवार ☆ सदस्य– हिंदी अध्ययन मंडल, पुणे विश्वविद्यालय, एस.एन.डी.टी. महिला विश्वविद्यालय, न्यू आर्ट्स, कॉमर्स एंड साइंस कॉलेज (स्वायत्त) अहमदनगर ☆ संपादक– हम लोग ☆ पूर्व सदस्य– महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी ☆ ट्रस्टी- जाणीव, ए होम फॉर सीनियर सिटिजन्स ☆
मोबाइल– 9890122603
संजयउवाच@डाटामेल.भारत
writersanjay@gmail.com
☆ आपदां अपहर्तारं ☆
गुरुवार 12 मार्च से हमारी आपदां अपहर्तारं साधना आरंभ होगी। यह श्रीराम नवमी तदनुसार गुरुवार दि. 26 मार्च तक चलेगी।
इस साधना में श्रीरामरक्षा स्तोत्र एवं श्रीराम स्तुति का पाठ होगा। मौन साधना एवं आत्मपरिष्कार भी साथ-साथ चलेंगे।
अनुरोध है कि आप स्वयं तो यह प्रयास करें ही साथ ही, इच्छुक मित्रों /परिवार के सदस्यों को भी प्रेरित करने का प्रयास कर सकते हैं। समय समय पर निर्देशित मंत्र की इच्छानुसार आप जितनी भी माला जप करना चाहें अपनी सुविधानुसार कर सकते हैं ।यह जप /साधना अपने अपने घरों में अपनी सुविधानुसार की जा सकती है।ऐसा कर हम निश्चित ही सम्पूर्ण मानवता के साथ भूमंडल में सकारात्मक ऊर्जा के संचरण में सहभागी होंगे। इस सन्दर्भ में विस्तृत जानकारी के लिए आप श्री संजय भारद्वाज जी से संपर्क कर सकते हैं।
≈ संपादक – हेमन्त बावनकर/सम्पादक (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ ≈