(पूर्वसूत्र- “नेमक्या कोणत्या थकीत कर्ज खात्यांमध्ये मी वसुलीसाठी आवश्यक तो पाठपुरावा योग्य पध्दतीने केलेला नाही हे त्यांनी निदर्शनास आणून द्यायला नको कां? सरसकट आरोप करून ते समाधानकारक स्पष्टीकरणाची अपेक्षाच कशी करू शकतात सर? ‘अकोला ब्रँचचा मी चार्ज घेण्यापूर्वीची तिथल्या गलथान कारभाराची नेमकी पार्श्वभूमी मी तुम्हाला सांगू कां? ‘ असं तेव्हा मी विचारलं होतं ना सर, ते यासाठीच.. ” मी म्हंटलं.
“तुम्ही जे कांही सांगणार होतात ते मला जरूर सांगा. पण या सगळ्याचं विनाकारण दडपण नका घेऊ. होईल सगळं व्यवस्थित. मी आहे ना? ” वखरेसाहेब म्हणाले.
वखरेसाहेबांच्या या शब्दांमधून जणू ‘तो’च मला आश्वस्त करतो आहे असंच वाटत राहिलं…!
पण पुढे घटनाच अशा घडत गेल्या की कांहीतरी विपरीत होणार असल्याच्या आशंकेने माझं मन सैरभैर होऊ लागलं..! )
इथून स्वेच्छानिवृत्ती योजनेसाठीचे अर्ज फाॅरवर्ड झाले त्याला चारसहा दिवस उलटून गेले होते. त्या अर्जांची छाननी करून अर्ज स्वीकृती, अस्वीकृती किंवा त्यांचे प्रलंबन याबाबतचे निर्णय सेंट्रल आॅफिसमधील संबंधित डिपार्टमेंटने तात्काळ म्हणजे ३१ डिसेंबर अखेर कोणत्याही परिस्थितीत घ्यायचे होते. तसे सख्त आदेश एम. डी. आॅफीस कडून त्यांना देण्यात आले होतेच. त्यानुसार तिथे युध्दपातळीवर सर्व कामे सुरूही झाली होती. त्यामुळे रोजच्या इनवर्ड मेलमधे पुणे रिजनमधील स्वेच्छानिवृत्तीसाठी अर्ज केलेल्यांची मंजूरीपत्रे रोज टप्प्याटप्याने येऊही लागली होती. अर्थात नाॅर्मल रूटीनमधे मलाही अर्ज स्वीकारल्याचं पत्र अपेक्षित होतंच. तरीही अकोला ब्रॅंचमधील थकीत कर्ज खात्यामुळे निर्माण झालेल्या प्रश्नामुळे जो अडसर निर्माण व्हायची शक्यता होती त्यामुळे फार तर चार दोन दिवस उशीरा मंजुरीपत्र येऊ शकेल असं मला वाटलं होतं. पण झालं भलतंच. मी नागपूर रिजनल आॅफीसला पाठवलेल्या सविस्तर उत्तरानंतर मला त्यांच्याकडून खरंतर पुढे कसलीही विचारणा किंवा अधिक स्पष्टीकरणाची मागणी आलेली नव्हती. तरीही एकेक दिवस उलटत चालला पण या बाबतीतली माझी प्रतीक्षा मात्र संपली नाहीच. वखरेसाहेब गेले चार दिवस ब्रॅंचेस् व्हिजीटच्या पूर्वनियोजित टूरवर होते त्यामुळे नेमकं काय करावं मला सुचेना. वाट पहाण्याशिवाय पर्यायच नव्हता. तो टूर प्रोग्राम संपवून साहेब आॅफिसला आले ते ३० डिसेंबरला. त्यांच्या अनुपस्थितीतल्या महत्त्वाच्या पेंडिंग मॅटर्सचा निपटारा करण्यात दिवसभर ते पूर्णत: व्यस्तच होते त्यामुळे त्यांना श्वास घ्यायलाही फुरसत नव्हती.
एकदा वाटलं त्याना भेटावं आणि सांगावं सगळं. निदान मनातली चलबिचल तरी कमी होईल. पण मलाच ते योग्य वाटेना. ते टूरवरून दमून आले होते. पुन्हा दिवसभर कामांचं दडपण. ते चिडले नक्कीच नसते पण तरीही..? माझ्या समोरचा प्रश्न माझ्या जीवनमरणाचा नाहीये हे मी स्वत:ला समजावलं आणि मनातले ते उलटसुलट विचार झटकून टाकले. ३० डिसेंबरचा दिवस असाच कोरडेपणाने उलटूनही गेला!
३१ डिसेंबर २००० चा दिवस उजाडला. त्यादिवशीही इनवर्ड मेलमधे माझ्यासाठी कांहीच नव्हतं!
अखेर परतीचे दोर असे पूर्णत: कापलेच गेले होते. आता यापुढे अधांतरी लटकत नाही रहायचं. जे समोर आलंय ते आहे तसं स्वीकारून पुढं जायचं आणि तेच आपल्या हिताचं असणाराय असा विचार केला आणि मन एकदम शांत झालं. आता माझा अर्ज प्रलंबित तरी रहाणार किंवा थेट नाकारला तरी जाणार हे जवळजवळ ठरल्यातच जमा होतं. यापैकी कांहीही झालं तरी ते माझ्यावर अन्याय करणारंच होतं. तरीही त्यानंतर नेमकं जे कांही होईल त्यानुसार तेव्हा काय करायचं करायचं ते वखरेसाहेबांशी बोलून ठरवता येईल असा विचार केला. वखरेसाहेबांची अशी आठवण झाली आणि सकाळपासून आपण त्यांना भेटलोच नव्हतो हेही लक्षात आलं. आज अर्जमंजूरीचा अखेरचा दिवस. त्यांना माझ्याबाबतीतल्या या अडचणीची पूर्वकल्पना असूनही त्यांनी गेल्या पंधरा दिवसांत त्याबाबत कांहीच केलं नाहीय यामागेही कांहीतरी कारण असणारच ना? त्यांच्यामागेही इतर अनेक व्यवधानं होती त्यात ते हा विषय विसरलेही असतील कदाचित. कांहीही असो पण जे व्हायचं ते आता होऊन गेलंय. आमचा लंचब्रेक झाला. मी सोबत आणलेला माझा डबा उघडला. तोंडात घास घेताना हात अडखळला. आपला इथला अन्नाचा शेर अद्याप संपलेला नाहीय असा विचार मनात आला न् मग माझं मलाच हसू आलं. आपण किती वरवरचा विचार करत असतो असंच वाटत राहीलं. जे कांही घडणार आहे ते तोच घडवणार आहे, मग आपला अन्नाचा शेर कुठं आणि किती दिवस हे ठरवणारे आपण कोण?
माझं खाणं आवरलं. शिपायाने सर्व्ह केलेला चहा घेऊन मी माझ्या टेबलावरची पुढची फाईल समोर ओढली तेव्हाच इंटरकाॅमची रिंग वाजली. फोन रिसेप्शनिस्टचा होता. ‘जस्ट अ मिनिट’ म्हणत तिने तो बंद केला. कदाचित वखरेसाहेबांनी आपल्याला बोलावलं तर नसेल? असंही वाटून गेलं पण ते तेवढंच. कारण माझी स्वेच्छानिवृत्ती आणि त्याचे मंजूरीपत्र हे विषय माझ्यापुरते मी पुसूनच तर टाकले होते! पण.. ते खोटं ठरवणारं, अचंबित करणारं वास्तव वखरेसाहेबांच्या केबिनमधे माझी वाट पहातंय याची मला पुसटशीही कल्पना नव्हती!
आज इतक्या वर्षांनंतरही त्यातला थरार मी विसरू शकलेलो नाहीय.
मी केबिनमधे जाताच वखरेसाहेबांनी माझं हसतमुखाने स्वागत केलं.
“काॅंग्रच्युलेशन्स अॅण्ड आॅल द व्हेरी बेस्ट.. ” ते म्हणाले.
त्यांचे प्रसन्नचित्ताने मला अशा शुभेच्छा देणं माझ्यासाठी त्याक्षणी वास्तव नव्हे तर स्वप्नवतच वाटत राहिलं.
“मिस्टर श्रीवास्तव, अवर नागपूर रिजनल मॅनेजर वाॅज नाॅट रेडी टू गीव्ह क्लीनचीट टू यू. तुमच्या Voluntary retirement साठी it was a big obstacle.. ” ते म्हणाले.
पण मग हा तिढा असा अचानक सुटला कसा हेच मला समजेना.
” तुम्ही नका दडपण घेऊ. होईल सगळं व्यवस्थित. मी आहे ना..? ” कांही दिवसांपूर्वीचे मला आश्वस्त करणारे वखरे साहेबांचे शब्द मला आठवले. ते केवळ माझी समजूत घालण्यासाठी बोललेले वरवरचे शब्द नव्हते याची ग्वाही आज दिवसभरात काय घडलं ते त्यांच्याकडून ऐकताना मला प्रत्येक क्षणी जाणवत होतं!
लहानपणापासून ती स्वतंत्र विचारांची होती. चाळीत शेजारी शेजारी लागून खोल्या. मनूचे वडील अगदी सामान्य नोकरीत आणि आई शिक्षिका.
मनू दिसायला काही सुंदर नाही पण अतिशय स्मार्ट आणि आरोग्याचं तेज होतं तिच्या सर्वांगावर. सुंदर तजेलदार वर्ण आणि मोठे डोळे.
मनू अभ्यासात हुशार तर होतीच पण उत्तम स्पोर्ट्स् पर्सनही होती. मनूच्या मैत्रिणीसुद्धा खूप. सतत घोळका तिच्या घरी यायचा आणि मनूच्या आई प्रेमाने त्यांना खायला करायच्या.
मनूच्या चाळीत खालच्या मजल्यावर नवीन बिऱ्हाड आलं. मनू तेव्हा असेल तेरा चौदा वर्षाची.
मनूच्या आई आणि मनू त्यांना भेटायला गेल्या. काही लागलं तर सांगा, बाई हवी तर पाठवू का असं विचारायला.
मनूला त्यांचा मुलगा भास्कर तिथे दिसला. तिच्यातून दोन तीन वर्षांनी मोठा असेल. किती देखणा होता तो दिसायला. उंच, लख्ख गोरा निळे घारे डोळे. मनू बघताक्षणी त्याच्या जणू प्रेमातच पडली.
भास्करला आणखी एक बहीण होती. ती नव्हती भास्कर सारखी देखणी. पण स्वभावाने खूप गोड आणि अभ्यासात हुशार. रेवतीची आणि मनूचीही छान दोस्ती झाली.
मनूला भास्कर फार आवडायचा. या ना त्या निमित्ताने मनू त्यांच्या घरी जायची. घरी काही छान केलेलं असलं तर आवर्जून भास्करच्या घरी द्यायची. चाळीतल्या बायका हसायच्या.
“मनू, प्रेमात पडलीस काय गो भास्करच्या? बघ हो. तू एवढी हुशार आणि तो आपला बेताबेताचा. रूप काय चाटायचं असतं का? ”
मनू काही बोलायची नाही. पण आपलं वागणं सोडायची नाही.
भास्कर तर तिच्याकडे सरळ सरळ दुर्लक्ष करायचा. तो बरा त्याचा अभ्यास बरा.
मनू उत्तम मार्क्स मिळवून अकरावी झाली आणि कॉलेजला गेली. मनू एमकॉम् झाली आणि तिला बँकेत नोकरी मिळाली. फार आनंद झाला तिला.
भास्करला मात्र कमी मार्क्स मिळाले. तो कॉलेजला गेला पण फार मोठं ध्येय काही नव्हतं त्याच्या डोळ्यासमोर. डिग्री घ्यायची आणि मिळेल ती नोकरी करायची असं माफक ध्येय होतं त्याचं.
त्या दिवशी मनू भास्करच्या घरी गेली. , तो एकटाच होता घरी.
“भास्कर, सरळच विचारते, मला फार आवडतोस तू. लग्न करशील माझ्याशी? मी छान संसार करीन बघ तुझा. माझ्या मनात फक्त तूच असतोस नवरा म्हणून कायम. करशील लग्न माझ्याशी? ”
भास्कर शांतपणे म्हणाला, ”मनू माझ्या मनात तुझ्याबद्दल अशा भावना मुळीच नाहीत. तू हुशार आहेस देखणीही आहेस. मी तुझ्याइतका मुळीच हुशार नाही.
आपलं लग्न झालं तर कायम माझ्या मनात ही तुलना राहील, की आपण मनूपुढे सामान्य आहोत. नकोच हे व्हायला
“अरे हे काय बोलतोस तू? मला जर तू आवडतोस तर या गोष्टींचा विचारच कसा येईल माझ्या मनात?
अजून विचार कर भास्कर. आपला संसार सुंदर होईल. मीही नोकरी करते आहेच. आपण मोठं घर घेऊ. ”
“हेच नकोय मला. तुझ्या जिवावर मला मोठं व्हायचं नाहीये. मला नाकापेक्षा मोती जड नकोय. आई पण हेच म्हणते माझी. ”,
मनूला आता राग आला. ”हो का? म्हणजे काकूंचं मत आहे हो हे? तुला स्वतःला नाही का काही समजत? ठीक आहे मग. ”
मनू तिथून निघून गेली. तिला रेवती भेटली.
“मनू आमचा दादा अगदी मूर्ख आहे बघ. मी पण स्वप्न बघितलं होतं की मनूच माझी वहिनी होईल. ,
सोड तू. त्याला अक्कल नाहीये. तुला खरंच याच्याहून चांगला हुशार जोडीदार मिळेल. हिरा टाकून घेईल काच हातात. मूर्ख आहे दादा. ”रेवती म्हणाली.
भास्करने एका फर्ममध्ये अकाउंटंटची नोकरी घेतली.
मनूला तिचे आईबाबा म्हणाले,
मनू, आता लग्नाचं वय झालं तुझं. बघायला लागू या ना मुलगे? बघ. ते घैसास विचारत होते त्यांच्या पुतण्या बद्दल. छान मुलगा आहे बघ अगदी. ”
“आई मला फक्त भास्करशीच लग्न करायचं आहे. पण तो नाही म्हणतो. ”
”मनू हा काय वेडेपणा? मूर्ख आहे असं म्हण तो मुलगा. अग हातात आलेला हिरा टाकतोय तो. असं समज की तोच तुझ्या योग्यतेचा नाहीये. असं नको करू मनू. ”
आई बाबांनी खूप समजूत घातली. मनू घैसासांचा जय बघायला तयार झाली. संध्याकाळी घैसास मनूच्या घरी आले. जय आणि आईबाबा आणि जयची बहीण.
जयला बघताक्षणीच मनू आवडली.
तिथेच त्याने सांगून टाकलं, “मनू मला आवडलीस तू. तुमचा होकार असेल तर अगदी साधे लग्न करायला मला आवडेल. मला डामडौल आणि उधळपट्टी आवडत नाही. ”
घैसास गेल्यावर बाबा म्हणाले, मनू, काय मग? आवडला का जय? किती स्मार्ट हुशार आणि पुन्हा खूप शिकलेला मुलगा आहे ग. काय कळवू त्यांना?
“बाबा हो सांगा त्यांना.
मला आवडला हा मुलगा.
आता भास्कर इतका सुंदर नाहीये पण हुशार आहे. ”
बाबा हसले. अजून ते भास्करचं खूळ आहेच का डोक्यात? मनू, संसार रूपावर होत नाही. पुरुषाची बुद्धिमत्ता महत्वाची. ”मनूला हे पटलं.
त्या रात्री ती भास्करला भेटली.
“भास्कर असं असं माझं लग्न ठरतंय.
तू हो म्हणालास तर अजूनही मी त्यांना नकार कळवू शकते”.
भास्कर म्हणाला, छे छे.. तू जरूर लग्न कर त्याच्याशी. माझ्या शुभेच्छा. ”
मनू घरी आली. साखरपुड्याची तारीख ठरली. मनूची आई हौसेने तयारीला लागली.
इतक्यात घैसासांचा निरोप आला. येऊन भेटा. मनूचे आईबाबा
घैसासांना भेटायला गेले.
जयच्या आईनी त्यांचे स्वागत केलं आणि म्हणाल्या,
“तुम्ही आमच्यावर अवलंबून राहू नका. लग्न ठरलं आणि माझी आई गेली अचानक काहीही हासभास नसताना, कोणताही आजार नसताना..
मनूचा पायगुण बरा नाही. कशाला विषाची परीक्षा बघायची? नकोच ते. आपण साखरपुडा रद्द करूया. ”
अहो पण.. जयचं काय म्हणणं आहे? या युगात कसले हो पायगुण आणि अशा गोष्टी? ”
जय माझ्या शब्दा बाहेर नाही. तर हे लग्न आता होणार नाही हे निश्चित. ”
आईबाबा हताश होऊन घरी आले.
मनू बँकेतून आल्यावर त्यांनी हे तिला सांगितलं. ,
”जाऊ दे ना आई. काही नका वाईट वाटून घेऊ. , आता मलाच लग्न करायचं नाहीये. माझ्यासाठी आता स्थळं बघू नका. ”मनू तिथून निघून गेली.
दरम्यान बऱ्याच गोष्टी घडल्या.
भास्करचे आईवडीलआणिभास्कर कोकणात जाऊन भास्करचं लग्न गुपचूप उरकून आले. कोणालाही पत्ता न लागता.
दुसऱ्या दिवशी घरात सत्यनारायणाला मात्र सगळ्या लोकांना बोलावलं. भास्करची बायको सगळ्याना प्रसाद देत होती. काकूंनी ओळख करून दिली.
ही अपर्णा. आमची नवी सून हो.
अगदी गडबडीत ठरलं सगळं. ”
कोणी काही बोललं नाही. मनू, तिचे आईवडील सगळे सत्यनारायणाला जाऊन आले.
दुसऱ्या दिवशी अपर्णा आपण होऊन मनू कडे आली. “मनू, काल नीटसं बोलणं झालं नाही आपलं. मला तुझ्याशी मैत्री करायला खूप आवडेल. इथे माझ्याएवढं कोणीच नाही. आणि तू नोकरी करतेस ना? मी फार शिकलेली नाही पण मला संसाराची खूप आवड आहे. मला स्वयंपाक करायला खूप आवडतो. ”
ही साधी सरळ मुलगी मनूला फार आवडली. चहा घेऊन ती निघाली आणि म्हणाली
” येत जा ग मनू. मीही येत जाईन तुमच्याकडे. चालेल ना काकू? ”
हसत हसत ती निघून गेली.
किती सरळ साधी आहे पोरगी ही.
भास्करपुढे दिसायला थिटीच आहे हो. ”मनूच्या आई म्हणाल्या.
अपर्णाने आपल्या गोड वागण्याने सगळ्याना आपलंसं करून टाकलं.
मनू तर तिची घट्ट मैत्रीण झाली. आपली सगळी गुपितं सांगायला हक्काची मैत्रीण मिळालीअपर्णाला.
“काय ग मनू. करून टाक की ग लग्न. मला बघू दे ना माझी मैत्रीण सुखात असलेली. ”
अपर्णा, आत्ता कुठे मी दुःखात आहे ग? नको वाटतं आता ते लग्न. तू तुझ्या नवरा आणि ही तुझी दोन गोड पोरं मस्त आहेत की. मी नाही ग बाई त्या फंदात पडणार.
मस्त पगार आहे, बँक फ्लॅट देतेय पण आईबाबा तयार नाहीत ना तिकडे यायला. ”मनू हसून म्हणे.
अपर्णाची जुळी मुलं मनूला फार फार आवडत आणि लाघवी अपर्णा अति माया करी मनूवर.
दिवस कसे पळत होते नुसते. अपर्णाचे मोहित रोहित आता आठ वर्षांचे झाले. अपर्णा संसारात बुडून गेली.
☆ ताण फार घेतो हल्ली आपण सगळे…. लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – स्नेहलता गाडगीळ ☆
वेळेवर उठण्यापासून वेळेवर झोपायचंय ह्याचाही ताण घेतो आणि एवढं करुन शेवटी झोप यायची तेव्हाच येते..
बहुतांश पब्लिक सोशल मिडिया मास्टर झाल्याने सगळ्यांना अति ज्ञान प्राप्त होतंय… त्यामुळे कुठलीही व्यक्ती गल्ली पासुन दिल्ली पर्यंत सगळ्या विषयावर खाडखाड बोलु शकतो…
त्यामुळे कधीकधी हे ज्ञान आपलं आपल्यालाच झेपत नाही आणि आपला ताण अजुनच वाढतो.
बारकाईने विचार करा…
साधं जेवणाचंच उदाहरण घ्या.. दहा वर्षांपूर्वी आपण सगळे मन लावुन वरण भात भाजी पोळी असं आनंदाने जेवायचो… कधी त्या अन्ना बद्दल आपण साशंक नव्हतो… पण आता…
या भाजीत हे व्हिटामीन..
पोळीत एवढ्या कॅलरी..
सॅलड पाहीजेच..
गोड नको रे बाबा…
हे तेल असं ते तेल तसं…
१०००० पावलं चाललंच पाहिजे..
फलाणं आणि बिस्तानं…
अरे दोन घास ताटात आलेत ते खायचे नाही नीट आणि शंभर नाटकं…
शिस्तीत रहा… शिस्तीत खा.. आणि आनंदाने जगा… हे सुत्रं नाहीच हल्ली…
प्रत्येकाला प्रत्येक गोष्टीत टॉपवरच जायचय… तरुणच रहायचय… तरुणच दिसायचय… कशासाठी…???
तरुण मुलांना दिसु द्या कि तरुण.. तुमचं तरुणपण झालय ना जगुन… आपण काय अश्वत्थामा आहोत का??? पृथ्वीवरच कायम रहायला..
Accept the reality… and live your life happily.
मी एक अति छोटी व्यक्ती आहे
जिला काहीही येत नाही.. काहीही दाखवायचंही नाही आणि सिद्ध तर मुळीच करायचं नाही..
असं रोज स्वतःला सांगितलं तर आनंदी आयुष्य जगणं सोपं आहे.
फार ताण नका घेऊ… आपल्या असण्या नसण्याने कुणाचं काहीही बिघडणार नाहीये…
काही दिवसांपूर्वी मी असंच खुप ज्ञानाचा विस्तार केला होता… माझ्या… पण मग माझ्या लक्षात आलं कि या ज्ञानाचा मला खुप जास्त ताण येतोय
मग सगळं बंद केलं… बातम्या बघणं बंद केलं… सिनेमा आणि मालिका बघणं बंद केल्या आणि आता खुssss प बरं वाटतय..
आता सध्या आला दिवस शांततेत घालवायचा प्रयत्न करतो… जुने सिनेमा बघणे… गाणी ऐकणे… आणि आवडेल ते काम करणे… हेच सुत्रं आहे सध्या…
तुम्हाला एक गंमत सांगतो…
नविन वर्ष सुरू झालं तेव्हा.. भविष्य सांगणारे अनेक व्हिडिओ यायला लागले…
राहु खराब… केतु खराब… देशाचं भविष्य खराब… हे खराब ते खराब… ताण यायला लागला हो…
म्हटलं हे ऐकुन वर्षभर सोडा आपला आत्ताच निकाल लागायचा…
… गीतरामायणातील अतिशय ह्रद्य असे, श्रीराम वनवासात जाताना आपल्या प्रियेचा निरोप घ्यायला सीतेच्या कक्षात येतात तेव्हा सीतेच्या तोंडी असलेले हे गाणे.
निरोप, एक साधा तीन अक्षरी शब्द, पण या एकाच शब्दामध्ये अनेक भावभावनांचा कल्लोळ दाटलेला असतो. एक प्रकारची हुरहुर, करुणा, वैषम्य, स्नेह, आनंद मनात साकारत असते. निरोप देणे म्हणजे नव्याचे स्वागत करणेही असते म्हणूनच काही वेळा निरोप देणे म्हणजे आनंद साजरा करणे असते.
आत्ताच पहा नं, आपण सरत्या वर्षाला निरोप देतोय आणि नविन वर्षाचे स्वागत करतोय. हा अतिशय आनंदाचा क्षण कारण फाल्गुन अमावस्येचा अंधार संपून चैत्राची नवी पहाट येते तेव्हा गुढ्या तोरणे उभ्या करुन आनंदोत्सव साजरा करतो.
तीस-पस्तीस वर्षे नोकरी करुन योग्य वयात सेवानिवृत्ती घेताना निरोप समारंभ होतो, रोजच्या धकाधकीच्या जीवनातून स्वतः साठी जगण्याची ही एक संधीच असते. घरी आलेल्या पाहुण्यांना निरोप देताना परत या असा आग्रहही असतो. एकाद्या सुंदरशा समारंभाचा शेवट आभार मानून करताना त्या समारंभाच्या यजमानांचा निरोप घेऊन आपण घरी परततो. लग्नात मुलीला सासरी पाठवताना तिला निरोप देताना घरच्या सगळ्यांना च भावना आवरता येत नाहीत. मुलीचे मनही कातर होतेच, हे जरी आनंदाश्रू असले तरी त्यातील निरोपाची भावना मनाला हुरहुर वाटणारीचं असते.
सहलीला जाताना मन अगदी आनंदाने भरून येते पण परतीचा प्रवास कधीतरी सुरु करावाच लागतो मग त्या उधाणलेल्या लाटा असोत, दरीडोंगर असोत किंवा एखादी मस्त बाग असो, निसर्गाच्या अद्भूत नजाऱ्याचा देखावा असो या साऱ्याला टाटा बायबाय करून आपल्या कर्तव्याच्या जगात परत यावचं लागते. एखाद्या सुंदरशा मैफिलीची सांगता करावीच लागते.
निरोप घेण्याचा आणि देण्याचा अतिशय ह्रद्य प्रसंग म्हणजे देशावरच्या सीमेवर लढण्यासाठी जाणाऱ्या जवानाला निरोप देण्याचा. आपल्या कुटुंबाला सोडून जाताना त्या जवानाचे मन कातर होतेच पण भारतमातेच्या रक्षणासाठी मन सीमेवर धावही घेते. घरच्यांची पण अवस्था यापेक्षा वेगळी नसते.
दहावीच्या निरोप समारंभात लहानपणापासून शिक्षण घेत आलेल्या शाळेचा निरोप घेताना त्या विद्यार्थ्यांना भावना अनावर होतातच पण पुढील शिक्षणासाठीची भरारी घेताना मन आतुरलेले असते.
म्हणूनच निरोप देणे म्हणजे नविनच्या स्वागतासाठी सज्ज होणे. इथे कुठेही भावनेला महत्व उरत नाही हेचं खरे.
“कर्तव्यापुढे मृत्यूची भीतीही फिकी पडते!” हरियाणातील फरीदाबादच्या २३ वर्षीय वैमानिक दीपिका अधाना हिने अटीतटीच्या प्रसंगात दाखवलेले धैर्य आज संपूर्ण देशासाठी प्रेरणा ठरत आहे. युएई (UAE) मधून १६९ भारतीयांना सुखरूप मायदेशी आणण्याची जबाबदारी जेव्हा तिच्यावर आली, तेव्हा परिस्थिती अत्यंत भयानक होती.
मोहिमेवर निघण्यापूर्वी दीपिकाने आपल्या कुटुंबाला फोन केला आणि ती भावनिक होऊन म्हणाली, “आई, काका… कदाचित मी पुन्हा दिसणार नाही, मला शेवटचं बघून घ्या. ” पण तिच्या कुटुंबाने खचून न जाता तिला लढण्याचं बळ दिलं!
या ऐतिहासिक उड्डाणाचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे विमानातील सहाही क्रू मेंबर्स महिला होत्या. कॅप्टनपासून ते क्रू सदस्यांपर्यंत सर्वांनीच या संकटात पोलादी जिद्द दाखवली. मानाचा मुजरा!
एटीसीशी संपर्क तुटला अन… : उड्डाणादरम्यान काही काळ एटीसीशी (ATC) संपर्क तुटल्याने सर्वांचाच श्वास रोखला गेला होता. मात्र, दीपिकाने डगमगता विमान नियंत्रित केलं आणि अवघ्या एका तासात सर्व प्रवाशांना घेऊन दिल्ली गाठली.
जेव्हा विमान दिल्लीच्या विमानतळावर उतरलं, तेव्हा प्रवाशांच्या डोळ्यांत आनंदाश्रू होते. १६९ भारतीयांसाठी दीपिका आणि तिची टीम साक्षात ‘देवदूत’ बनून आली होती.
२३ वर्ष हे वय खेळण्या-बागडण्याचं असतं, पण दीपिकाने या वयात मृत्यूला डोळ्यांत डोळे घालून आव्हान दिलं. हीच खरी ‘नारीशक्ती’ आहे!
“स्वतःच्या प्राणाची पर्वा न करता १६९ भारतीयांचे प्राण वाचवणाऱ्या या वाघिणीचा – दीपिका अधानाचा हा पराक्रम घराघरात पोहोचवण्यासाठी पोस्ट शेअर करा! ”
माहिती संग्राहक : अज्ञात
प्रस्तुती : अंजली दिलीप गोखले
मोबाईल नंबर 8482939011
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
दुपारचे दोन वाजत आले होते. ऊन चांगलंच चढलं होतं. घरी परतायची घाई होती. मुलं शाळेतून आली असणार. त्यांचं जेवण, अभ्यास, आपली कामं, सगळंच वाट बघत असतं. तरीही या रस्त्यावर नेहमीप्रमाणे गाडीची गती मंदावतेच, पावलं जराशी रेंगाळतातच. कारण या रस्त्यावर आई रहाते. तिला दोन मिनिटं भेटून येऊ असा विचार मी करते.
कित्येकदा इथे जवळपास कामासाठी येऊन जाते, पण तिला सांगत नाही. सांगितलं, तर घरी का आली नाहीस, म्हणून ती रागावते. पण आपल्याला कायमच घाई असते. आज वाकडी वाट करून तिला भेटूच म्हणते.
ढळढळीत दुपारी मला दारात पाहून आई जरा चमकतेच.
काय ग अचानक? म्हणत लगेच हातात पाणी देते.
काही नाही गं… सहज आले, म्हणत आईच्या सोफ्यावर धपकन बसते. इथे धपकन बसायला फार मजा वाटते. मग तिच्या जिव्हाळ्याचा प्रश्न येतो,
‘जेवलीस? ‘
मी नाही म्हणते, घरी जाऊन (आपणच बनवलेलं) जेवायचं असतं. जरा इकडचं तिकडचं बोलतो आम्ही.
परत जिव्हाळा प्रश्न रिटर्न्स, जेवतेस का? मी नको गं… म्हणत असतानाच, उशीर बघ किती झालाय, मुलं बघतील आज एक दिवस स्वतःचं, जेऊनच जा म्हणत, एकीकडे ती स्वयंपाकघरात शिरतेसुद्धा.
एकटीच असल्याने स्वतःपुरता सकाळचा स्वयंपाक करून तिने संपवलेला असतो. त्यामुळे माझ्यासाठी आता स्क्रॅचपासून सुरुवात करायची असते. तिला काम करावं लागतं, या गोष्टीचं मी स्वतः आई झाल्यापासून मला फार वाईट वाटतं. पण तसंही आईचं कायम ऐकावं, हे मी नाहीतरी आमच्या लेकीला बजावत असतेच. त्यामुळे मी तिचं निमूट ऐकते.
‘जरा वेळ टीव्ही बघ, मी करते काहीतरी’ म्हणत, साठी ओलांडलेली माझी आई, एकीकडे कांदा चिरायला घेते.
काही मदत करु का गं? या प्रश्नाचं उत्तर ‘ नको, बस नुसती ‘ असं येणार हे माहीत असलं, तरी मी उगाच तिला विचारते. कारण हे उत्तर ऐकायला मला आवडतं.
पाच मिनिटात स्वयंपाकघरातून कांदा फोडणीत घातल्याचा वास, कुकरच्या शिट्टीचे, भाकरी थापल्याचे आवाज येऊ लागतात. मला तिच्या हातची भाकरी प्रचंड आवडते, हे ती कधी म्हणजे कधीच विसरत नाही. माझ्यासाठी जगातला बेस्ट शेफ कामाला लागलेला असून सगळ्यात सुंदर अन्न बनत असतं.
पहिल्या घासाबरोबरच मी आनंदाचा कढ गिळते आणि मला जेवताना बघून आईची पुढच्या चार दिवसांची भूक भागते. पांढऱ्याशुभ्र भाकरीचे पदर व्यवस्थित सुटलेले, पिठल्याची कंसिस्टंसी परफेक्ट, कोशिंबीरीला घरचं दही, इतकं साधं आणि रुचकर जेवण आपण खूप दिवसात जेवलो नाहीये हे मला जाणवतं. आजकाल इतक्या हॉटेलांचे रिव्ह्यू वाचत असतो आपण, पण या जेवणाचा रिव्ह्यू लिहायला शब्द कमी पडतील. आणि तसंही, देव, बच्चन, पुलं, लताबाई आणि आईच्या हातचं जेवण यांचे रिव्ह्यू लिहू नयेत.
आज पुन्हा एकदा पटलं, पोट भरणारं जेवण सगळीकडे मिळतं, पण तृप्त करणारं जेवण फक्त आईकडे मिळतं!
*
लेखिका: सुश्री गौरी ब्रह्मे.
प्रस्तुती :श्री मनोहर जांबोटकर
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
(संस्कारधानी के सुप्रसिद्ध एवं अग्रज साहित्यकार श्री जय प्रकाश श्रीवास्तव जी के गीत, नवगीत एवं अनुगीत अपनी मौलिकता के लिए सुप्रसिद्ध हैं। आप प्रत्येक बुधवार को साप्ताहिक स्तम्भ “जय प्रकाश के नवगीत ” के अंतर्गत नवगीत आत्मसात कर सकते हैं। आज प्रस्तुत है आपका एक भावप्रवण एवं विचारणीय नवगीत “बज रहे हम” ।)
जय प्रकाश के नवगीत # १३९ ☆ बज रहे हम ☆ श्री जय प्रकाश श्रीवास्तव ☆