मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ अडगळ ☆ सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆

सौ. मंजुषा सुनीत मुळे

? मनमंजुषेतून ?

☆ अडगळ ☆ सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆

‘कुणी घर देता का घर?’ इथं पासून ‘कुणी घर आवरुन देता का घर’ इथपर्यंत आयुष्याची गाडी घरंगळत आली खरी, पण कशी कधी ते कळलंच नाही. पैसा – नोकरी – घर – पद – प्रतिष्ठा ही स्टेशनं बघता बघता मागे पडली आणि ‘निवृत्ती’ या शेवटच्या स्टेशनवर ती सुसाट धावणारी गाडी कधी ना कधी येऊन थांबणार हे कळत असूनही वळत मात्र नव्हतं… तोपर्यंत सतत कशाच्या ना कशाच्या मागे धावणं, स्वत: सर्वात पुढे रहाण्याच्या अट्टाहासापायी ठेचकाळणं… धडपडणं… आज हे हवं… उद्या ते हवं… हवं म्हणजे हवंच हा हट्ट… (की हवरटपणा) कधी घट्ट मित्र झाला ते कळलंही नाही.

अखेर त्या शेवटच्या स्टेशनवर येऊन थांबलेल्या गाडीतून बाहेर पडल्यानंतर, आता नेमक्या कुठल्या रस्त्याने जावं हे ठरवण्यातच काही वर्षं सरली… त्यात शरीरही थकलं आणि मनही.  

‘ घरात त्या शेजारच्यांसारखं फर्निचर हवं… अमकी सारखी क्रोकरी हवी… तमकीसारखा फ्रीज हवा… घरातल्या प्रत्येकासाठी स्वतंत्र आणि सुसज्ज खोली हवी… आणि ओघानेच ती ‘डेकोरेटिव्ह’ हवी…’ या सगळ्या हव्यासापायी किती सामान साठवलं होतं घरात ते आता प्रकर्षाने जाणवायला लागलं… पिल्लं आकाशाचा वेध घेत घरातून उडून गेलेली… आणि आता आम्हीही त्या सामानासारखीच एक अडगळ बनायला लागलेलो…

काय करावं… कितीतरी गोष्टी आता अनावश्यक वाटायला लागल्या होत्या. म्हणजे त्यांची अडगळच वाटायला लागली होती… कमी करायला हवी ती अडगळ. पण कशी?…एकट्याला झेपणारं कामच नव्हतं ते…

किती ठिकाणी… किती जणांना विचारलं… मदत करता का म्हणून… जाहिरातही दिली… पण खात्रीशीर कुणी भेटलंच नाही. मग काय… हे सगळं स्वत:च आवरायला लागणार या विचारानेच हतबल झाल्यासारखं वाटलं… कुठून सुरुवात करावी या विचारात एक दिवस नुसतीच बसून राहिले होते… आणि…

आणि अचानक आणखी एक घर मला कळवळून हाका मारतंय्… माझ्यातलीही अडगळ काढून टाक म्हणून विनवण्या करतंय् असं जाणवायला लागलं… आणि क्षणभरात लख्खकन् ते घर डोळ्यासमोर आलं… हो… ते दुसरं घर… माझ्या मनाचं घर… आणि माझ्याही नकळत क्षणार्धात मी त्या घरात पोहोचले सुध्दा… स्थळकाळाचं भान हरपून गेल्यासारखी… आणि ते घर पहातांना आपोआप डोळे विस्फारले…

बापरे… या मनातल्या मूळच्या सुंदर-नितळ घराला ना भिंती… ना छप्पर… ना दार… ना कड्या कुलुपं…आणि आपोआपच अडगळ साठवायला जागाच जागा… आणि खरोखरच साठलेली प्रचंड अडगळ… नुसती अडगळ नाही… त्यावर घट्ट चिकटलेली गडद जळमटं… कधी कशी साठत गेली ही एवढी अडगळ? आठवायचा प्रयत्न करायला लागले. खरं तर कितीतरी गोड-सुखद आठवणींची प्रसन्न हिरवाईही होतीच की त्या जोडीने. पण या दाट जळमटांनी ती पूर्ण झाकून टाकली होती. एक एक जळमट प्रयत्नपूर्वक झटकायला लागले… आणि… हळूहळू सगळं दिसायला लागलं…

‘‘बाबांनी ताईला मात्र झालरी झालरींचा सुंदर फ्रॉक आणला… आणि मला मात्र हा असा… फुलंबिलं आहेत यावरही… पण रंग कसला? काय तर म्हणे मी कपडे खूप मळवते…” इथूनच सुरूवात… हा विचार एका कोप-यात दडून गेलेला… पण नेमकाच आठवला… आणि झाली सुरूवात… किती-किती गोष्टींची अडगळ होती त्या घरात…

‘ माझी काहीही चूक नसतांना बाईंनी मला शिक्षा केली… आणि चूक करणारी ती दुष्ट मुलगी माझ्याकडे पाहून कुत्सित हसली ’… तिचं हसणं विसरूच शकत नव्हते मी… ते आत्ता असं इथे पुन्हा दिसलं. 

‘ तो मला असं म्हणाला ’… ‘ ती मला विनाकारण असं बोलली ’… ‘ आणि तो काय समजतो स्वत:ला… जगातला काही एकमेव मुलगा नाहीये तो ’… अश्रूंनी माखलेला हा विचार… अश्रू सुकले तरी अजून आहेच की एका कोप-यात…

‘ सासूबाई किती भेदभाव करतात माझ्यात आणि माझ्या जाऊबाईंमध्ये… नणंदेमध्ये ’…. ‘ ‘ यांना ना काही कौतुकच नाहीये माझं… त्या तिच्यासारखी बायको मिळायला हवी होती यांना, मग कळलं असतं…’

…हे असले विचार निरर्थक आहेत हे समजेपर्यंत त्यांची अडगळ फारच साठते आहे मनात हे लक्षातच कसं नाही आलं आपल्या?…’ पण हा विचारही नकळत बारगळला प्रत्येक वेळी… आणि तितक्याच नकळत या अडगळीत दिसेनासा झाला.

… ‘ यांना कशी बाई अशी पटकन् छान नोकरी मिळते?’

… ‘ त्या काल बदलून आलेल्या क्लार्कवर साहेबांचा जास्त भरवसा… आणि आम्ही इथे मरमर काम करतोय्… त्याची दखली नाही?…’

…‘ तिला कसा इतका छान फ्लॅट मिळाला?… आमच्या मेलं नशिबातच नाही…’

…‘ यांना ब-या हव्या तिथे बदल्या मिळतात… आम्ही आपली गाठतोय वर्षानुवर्ष… दोन दोन तास खर्च करायला लावणारी लोकल… सकाळ… संध्याकाळ…’

… बापरे बापरे… आता आपोआप दिसायला लागले अनेक वेगवेगळे स्टँड आणि त्यावर दाटीवाटीने अडकवलेली ही इतकी प्रचंड अडगळ… किती भक्कम असतील हे स्टँड… असूया – मत्सर -द्वेष – हेवेदावे – हाव – असंतुष्टपणा – राग – संताप – गढुळलेले विचार… अस्वस्थता.. अशांतता… अशी आणि आणखी कितीतरी लेबलं लावलेले स्टँड आणि त्यांना लटकलेल्या असंख्य आठवणींची… वेळोवेळी मनात आलेल्या अविचारांची अक्षरश: ‘अडगळ’.

… आणि जाणवलं… रहात्या घरातली अडगळ तशीच ठेवून निरोप घेणं फारसं अवघड नसावं… पण ही मनातल्या घरातली अडगळ स्वच्छ न करता निरोप घेणं, म्हणजे ती तशीच सोबत घेऊन जाणं भाग पडणं… नको नको… रिकाम्या हाताने आणि रिकाम्या मनाने आलो होतो… तसंच अगदी तसंच… परत जायला हवं… तेव्हा हात तर रिकामेच असतील आपोआप… पण मन मात्र जाण्याआधी स्वत:च प्रयत्नपूर्वक रिकामं करायला हवं… त्यासाठी कितीही पैसे मोजले तरीही कुणी येणार नाही मदतीला हे प्रकर्षाने जाणवलं, आणि नकळत मनानेच निर्धार केला… त्याहीपेक्षा हिंमत बांधली… कंबरच कसली म्हणा ना… आणि केली तर आहे आता सुरुवात… बघू… प्रयत्न तर चालू आहे मार्ग शोधण्याचा… पण ही मनातली अगम्य आणि मनाइतकीच अथांग पसरलेली अडगळ किती आणि कशी आवरता येणार आहे हे तो परमात्माच जाणे… पण त्याच्या चरणी एकच प्रार्थना आहे… ही अडगळ मनातून पूर्ण काढून टाकून अगदी स्वच्छ-निर्मळ आणि निरपेक्ष मनाने त्याच्याकडे पोहोचेपर्यंत पुरतील एवढे दमदार श्वास मात्र त्याने पुरवावेत… त्याच्याकडून आता एवढीच अपेक्षा आहे.      

माहिती संकलन : सौ. मंजुषा सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ते सतरा दिवस – भाग -2 ☆ डॉ. जयंत गुजराती ☆

डॉ. जयंत गुजराती

? इंद्रधनुष्य ?

☆ ते सतरा दिवस… – भाग-2 ☆ डॉ. जयंत गुजराती ☆

(निराश होता कामा नये हा संदेश प्रत्येकापर्यंत पोहोचला. सर्वांनी एका आवाजात साहेबांच्या शब्दांवर प्रतिध्वनी उमटवला, जय हो !!) — इथून पुढे 

आजचा तिसरा दिवस, बहात्तर तास उलटून गेलेले बाहेरचं जग पाहून. विजेची लाईन शाबूत असल्याने त्या उजेडात एकमेकांना पाहू तरी शकत होतो. पाण्याच्या बाटल्या, रेशनिंगचं धान्य संपत आलेले.  हेल्मेटमधे तांदूळ शिजवून गिळत असलेलो. काही ठिकाणी डोंगरातून पाणी ठिबकत असलेलं. तिथेही हेल्मेट उपडी ठेवलेली. ते काही वेळानं जुजबी भरत असे. सुकलेला गळा ओला करायला तेवढंसं पुरे. पण ..  पण हे असं किती दिवस? हा यक्षप्रश्न आ वासून उभा ठाकलेलाच. नुकतंच थोडंफार पोटात ढकलून आडवं पडणं झालं, डोळे पेंगुळत असलेले…. 

… तेवढ्यात सरसर आवाज आला. वाटलं जनावर वगैरे काही आलं की काय? आवाजाच्या रोखानं मोबाईलची बॅटरी रोखली तर काय सहा इंची पाईप बोगद्यात तोंड उघडत असलेला. त्यातून पाठोपाठ अनोळखी आवाज येत असलेला. ” कैसे हो सब लोग?” बोगद्यातील सर्वजण चित्कारलेच. “ ठीक है भैया, कैसे तो भी गुजारा कर रहै है. हमें यहां से निकालो जल्दी.”  आमचा आवाज ऐकून बाहेर एकच गलका झाला असावा. लगेच, “ डरो मत, हम कोशिश कर रहे हैं. जल्दही आप निकल पाओगे. धैर्य रखना, बौखनाग की कृपा से सब बाहर आओगे.” सर्वांना आठवलं, मागच्याच आठवड्यात तर बौखनागचं मंदिर पाडलं होतं. तोच कोपला असेल. सर्वांनी हात जोडून त्याचा धावा सुरू केला. त्या सहा इंची पाईपमधून पाण्याच्या बाटल्या यायला लागल्या. मग बिस्कीटांचे पुडे, ड्रायफ्रूटचे पॅकेट्स, फळं. चला, निदान शिदोरी वाढत असलेली पाहून सर्वांचे डोळे चमकले. त्या खाऊपेक्षाही बाहेरच्या जगाशी संपर्क होत असलेला पाहून हायसं वाटलं. त्यातून येणारा आवाज तर वॉकीटॉकीपेक्षाही स्पष्ट होता. 

नियमित खुराक मिळण्याची सोय तर झाली. गोळ्या औषधंही आली पाईपमधून. सगळ्यांचं मनोबल वाढावं म्हणून मनोचिकित्सक ही हजर पाईपच्या दुसऱ्या टोकाला. तितकंच बरं वाटलं. थोडंफार निर्धास्त होता आलं. कुणीतरी आपल्यासाठी धडपडतंय ही जाणीव सुखावहच. आणखीन दोन दिवसांनी तर घरच्यांचा आवाज पाईपमधून. कोळशाच्या खोलीत कोंडणारी आई  गलबलून हुंदका देत बोलत होती, 

“बबुआ कैसन बा?” कोळशाच्या खोलीत रमणारा बबुआ हमसून हमसून रडत बोलत होता, “ ठीक हूं मैय्या, फीकर मत करना, टेम से तू खाना खा लेना. ” सर्वांचेच डोळे पाणावले. 

दहाएक दिवसांनी गरम गरम जेवण मिळू लागले. छोले, पराठे अन् खिचडी.  शीख बांधवांनी लंगर चालू केलंय वाटतं. वाहे गुरू त्यांचं भलं करो. रोज चिणल्या गेलेल्या भिंतीतून मोठाले पाईप टाकण्याचे काम प्रगतीपथावर आहे हे बातम्यांसारखं सांगितलं जायचं. मधेच अडथळे यायचे. काम थांबवावं लागायचं. प्रगती खुंटायची. काहीच कळायचं नाही. बाहेर तरी निघू की नाही ही साशंकता. मग इतके दिवस नेहेमी सोबतीला असणारे, एकमेकांचेच चेहरे पाहून कंटाळलेलो, एकमेकांवरच चिडचिड करू लागलो. काहींनी तर त्रागाही केला. इंजिनीयर साहेबांनी मग वेगवेगळे खेळ खेळण्याची टूम काढली. काहींचे मोबाईल अजूनही चालू, त्यांनी मोबाईलवरच लुडो खेळायला सुरुवात केली. इंजिनीयर साहेबांनी मग मोजकेच चार्जर मागवून घेतले. चार्ज केल्यावर फोन तर लागत नव्हते, पण त्यातील खेळ व जुने मेसेजेस वाचून, दिवस वा रात्र ते काहीच कळत नव्हतं, तरीही पण ढकलत होतो.  सगळेच्या सगळे काही मोबाईल वेडे नव्हते.  मग काहींनी दगडावर रेघोट्या ओढून चल्लस खेळायला सुरुवात केली.  काही दगडी चेंडूने क्रिकेट खेळायला लागले, बोगद्याच्या भिंतीवरच स्टम्प्स उगवले. एकाने चार पाच गोल दगड  एका पाठोपाठ वर फेकत जगलर्स स्कील ही दाखवले. काहींनी गाणी म्हणायला सुरुवात केली. त्यात बंगाल्यांनी तर कहरच केला. अगोदर ऐकायला गोड वाटलं, पण किती गावं? सारखं तेच तेच कानी यायला लागलं, आमार शोनार बांग्ला आणि बाऊल गीति, काय काय ते. सगळ्यांचे कान किटले.  फिल्मी गाण्यांची अंताक्षरीही काही काळ चालली मग त्याचाही वीट आला.  

कितीही मन रमवण्याचा प्रयत्न करत असलो तरीही मोकळ्या वातावरणाची आस प्रत्येकाच्या मनात. जसजसा वेळ सरकत होता तसे बोगद्याच्या भिंती खायला उठतात की काय? वाटायचे. एकमेकांना धीर देणं तर चालूच होतं, पण बोगद्यामधला मुक्काम लांबतच चाललेला. घरच्या माणसांची ओढही बळावत चाललेली.  कधी त्यांची गळाभेट घेऊ असं होऊन गेलेलं. उद्या सकाळपर्यंत बाहेर निघणार, अगदी चार पाच तासच उरलेत म्हणता म्हणता विघ्न समोर ठाकल्याचंही कानी यायचं. मशिन बिघडलं, बंद पडलं. अडकून पडलं. दोन दिवस अधिक लागतील.  ऐकून ऐकून कान विटले. देवाचा धावा तर सारखा चालूच होता. नवसाचंही बोलून झालं होतं. मधेच दिवाळी होऊन गेल्याचं कळलं. बाहेरच्या जगात सगळ्यांसाठी दिवाळी होती. बोगद्यात व मनात तर अंधारच अंधार दाटलेला. 

थोडक्यावर अडून पडलंय. नवीन खुदाई सुरू झालीय. काही हाताचेच अंतर बाकी आता. इंजिनीयर साहेबही तांत्रिक भाषेत बोलत होते. बाकी सगळे कधी शिळा उघडते, सीम सीम खुलजाच्या धर्तीवर याची प्राण कंठाशी आणून वाट पहात होते. काहीही करत नसले तरी सगळे दमूनभागून पेंगुळलेल्या डोळ्यांनी निपचित पडले होते. तेवढ्यात धपकन् काही पडल्याचा आवाज आला, पाठोपाठ खणन् खणन्  व लगेच कटरचा चिरपरिचित आवाज येऊ लागला.  तो आवाज पहिल्यांदाच मंजुळ नादमय वाटला. सर्वांचे डोळे बंद झालेल्या बोगद्याच्या मुखावर. त्याला चिरे पडू लागले. मोठमोठाले घाव हातोड्याचे व मग भगदाडच पडले एकदम. सरसर पाईप सरकत आत आला.  त्यातून नवा चेहरा व नवा उजेडही आत आला. सगळ्यांनी आरोळी दिली, जय हो !! तो आवाज बोगदाभर घुमला. धुळीने माखलेल्या चेहेऱ्यांवर आनंद पसरला. कुणी नाचू लागले, कुणाला अश्रू आवरेना. बौखनाग बाबांचा जयघोष केला गेला. आता खरी दिवाळी साजरी होईल याची खात्री पटली.  शेवटी एकदाचे गिळू पाहणाऱ्या बोगद्याच्या कराल जबड्यातून बाहेर येत मोकळा श्वास घेतला. हुश्श ! एक दुःस्वप्न विरलं !! 

– समाप्त – 

© डॉ. जयंत गुजराती

२९/११/२०२३

नासिक

मो. ९८२२८५८९७५

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ते सतरा दिवस – भाग -1 ☆ डॉ. जयंत गुजराती ☆

डॉ. जयंत गुजराती

? इंद्रधनुष्य ?

☆ ते सतरा दिवस… – भाग-1 ☆ डॉ. जयंत गुजराती ☆

“लहानपणी माझी आई मला असंच कोंडून ठेवायची. द्वाड होतो ना मी ! तासनतास खोलीचं दार उघडायची नाही. अगोदर बरं वाटायचं.. खोलीत मी एकटा व भवताली अंधार. कोळशाची खोली होती ना ती ! चार बाय दोनची. मी त्यातही खेळायचो. महिनाभराचा कोळसा त्या खोलीत ओतला जायचा. तीन चार गोण्या तर खास, आंघोळीला व सैंपाकासाठी चूल त्यावरच चालायची. गॅस तर आता कुठे चार वर्षांपूर्वी आला घरात उज्ज्वला योजनेतून. आई फुंकणीने चूल पेटवायची व दोन खोल्यांचे घर धुराने भरून जायचे. आता आताशा तर धूराने आईला धापही लागत होती. गॅस आल्याने तेवढं बरं वाटतं तिला ! खरंतर त्या कोळशाच्या खोलीत कोंडले गेल्यावर मला बरं वाटायचं. खोड्या काढणं, उनाडक्या करणं याने मी गल्ली, मोहल्ल्यात बदनाम. रोज कुणी ना कुणी तक्रार घेऊन यायचंच घरी, आई कावली जायची. व शिक्षा म्हणून मी कोळशात. पण खरं सांगू का त्या उनाडक्या व त्या खोड्या मला जाम आवडायच्या.  कोणीतरी रागावून घरी येतंय आपल्यामुळे याचं समाधानही वाटायचं, मला शिक्षा झाली की सूड उगवल्याचं समाधान आरोप करणाऱ्याला होणार नाही इतकं मला व्हायचं. मग कोळशाने मी काळा ठिक्कर झालो तरी त्याचं काही वाटायचं नाही. काही वेळाने आईच मला बाहेर काढायची. मग रगरग रगडून आंघोळ घालायची. मला घालून पाडून बोलायची. कशाला एवढी मस्ती करतोस? आपण गरीब माणसं, इतकं द्वाड असू नये, तुझ्यामुळे मलाही बोलणी खावी लागतात. अपमान गिळावा लागतो.  त्या गल्लीत आम्हीच तेवढे गरीब, मग माझ्याने आमच्या गरिबीबद्दल बोललेलं मला सहन व्हायचं नाही. मी उट्टं काढण्याच्या प्रयत्नात. बाबा पैका कमवायला बंबईला गेले आणि आम्ही बिहारला पोरकेच. ” त्याने एक दीर्घ सुस्कारा टाकला. 

सगळे त्याचं म्हणणं कान टवकारून ऐकत होते. तेवढंच तर करता येत होतं. एकमेकांशी बोलत राहण्यावाचून पर्याय नव्हता. काहीच कळत नव्हतं, दिवस आहे की रात्र. नेमका काळ ओढवल्यासारखं वाटायचं. जीवाची घालमेल सारखी. सगळे कोंडाळे करून बोलत रहायचे. आजचा तिसरा दिवस बहुतेक. परवाच तर घटना घडलेली. तेव्हा उठलेले अंगावरचे शहारे अजूनही तसेच. कितीतरी वेळा जे घडलं तेच डोळ्यासमोर येत असलेलं सारखं. 

धडामधाडधाड करत दगड माती खाली आली. वाटलं डोंगरच कोसळला. डोक्यावर पडू नये तसे सगळे सावध होऊन पुढे पळाले तसा परतीचा मार्गच बंद झाल्याचे लक्षात आले. अरे देवा !! जो तो हळहळायला लागला. अगोदर तर धुरळाच उठलेला. सगळं अंधूक अंधूक दिसत असलेलं. नुसता आरडाओरडा बोगद्यात. अजूनही दगड खाली येत असलेले. पुढे धावताना कुणी ठेचकाळलं, पडलेही, मग एकमेकांचा आधार घेत हाताला हात धरून उभं राहणं झालं. नेमकं काय घडलंय याचा अंदाज यायलाच अर्धा तास लागला. ज्युनियर इंजिनिअरसाहेब बरोबर होते  ते ओरडले, “ लॅण्ड स्लाईड झालीय बोगद्यात. आपापल्या डोक्यावर हेल्मेट आहे ना ते पाहून घ्या, अजून डोंगर खाली येऊ शकतो. आपण चाळीसच्या वर होतो चमूत. तितकी डोकी आहेत ना शाबूत मोजून घ्या, कुणाला खरचटलं, लागलं तर नाही ना? हाडं वगैरे मोडली नाहीत ना? बांका प्रसंग आलाय. धीर धरा, बघू काय करता येतंय ते. ” धूरळा बसायला लागला तसं सगळ्यांना धीर आला. सगळेच तसे धूळीने माखलेले. अगदी नाकातोंडातही धूळ. कुणी अंग झटकतंय, कुणी खोकतोय. चलबिचल प्रत्येकाची. काय घडलंय याची स्पष्ट जाणीव होत असलेली हळुहळू व पुढे काय वाढून ठेवलंय याची धाकधूक. जीव तसा अधांतरीच प्रत्येकाचा. 

अचानकच घडलं एकदम. बोगदा खोलवर खोदत असताना मागच्या मागे डोंगराने दगड माती लोटून भिंतच उभारली. वाटलं असेल दोन चार फूट लांब पण इंजिनिअर साहेब म्हणाले शंभर दोनशे तीनशे मीटर लांब असू शकते. पहिल्यांदा तर आवाजाबरोबर काळोखच पसरलेला. मग बोगद्याच्या कडेने टाकलेल्या लाईनीतील ब्रॅकेटमधले दिवे पुन्हा लुकलुकायला लागले. जसजसं दिसायला लागलं थोडंफार तसं  ‘आहे रे ‘चा पुकारा सर्वजण करू लागले. सर्व मिळून एक्केचाळीस डोकी गणली गेली. इंजिनीयरसाहेब एका दगडावर उभे राहिले. त्यांचेही हातपाय लटलटत असलेले. बाकीचे सगळे मटकन् खाली बसले धुळीतच. अंधुकशा उजेडात साहेब गंभीर दिसत होते. डोक्यावरचं पिवळं हेल्मेट सावरत, दगडावरचा तोल आवरत ते ठामपणे उभे राहिले. खोलवर गेलेल्या आवाजाने बोलू लागले. “ माझ्या बांधवांनो, माझ्या आयुष्यातील हा पहिलाच कटोकटीचा प्रसंग उभा ठाकलाय. आपणा सर्वांसमोरच मोठं आव्हान आहे. आपण ज्येठ, कनिष्ठ, लहानमोठं कुणीही नाही. सर्व भारत मातेची लेकरं आहोत. आपण आत अडकलोय हे बाहेरच्यांना एव्हाना कळलं असेल. ते आपल्याला बाहेर काढण्याचा आटोकाट प्रयत्न करतील, पण आतमधे एकमेकांना सांभाळून राहायची जबाबदारी आपलीच आहे. तेव्हा एकमेकांना सहकार्य करत हा प्रसंगही निभावून नेऊ. देवाची प्रार्थना करूयात. तो जगन्नियंता आपल्याला तारून नेईल यावर विश्वास ठेवा. आपापल्या चीजवस्तू कमीत कमी वापरा. विशेषतः मोबाईल व त्याची बॅटरी जपली पाहिजे. एका दोघांचेच चालू ठेवा, बाकीचे स्वीचऑफ करा, किमान तीन चार दिवस तरी त्यावर काढता येईल. निदान  वेळ व तारीख तरी कळेल. पिशव्यांमधे जे काही हाताशी शिल्लक असलेले धान्य, खुराक याचं रेशनिंग करूयात. आपल्याकडे दोन किलोमीटरचा पट्टा आहे. त्यात हिंडू फिरू शकतो. कमीतकमी हालचाल करूयात , म्हणजे दमणं होणार नाही. आपली ताकद जपूयात.  विश्रांती जास्तीत जास्त घेऊयात. यातूनही मार्ग निघेल, आपले देशबांधव आपल्याला वाऱ्यावर सोडणार नाहीत याची खात्री आहे मला.  तेव्हा जय हो !! “

साहेबांच्या शब्दा शब्दागणिक जगण्याचा हुरूप वाढत गेला. निराश होता कामा नये हा संदेश प्रत्येकापर्यंत पोहोचला. सर्वांनी एका आवाजात साहेबांच्या शब्दांवर प्रतिध्वनी उमटवला, जय हो!! 

– क्रमशः भाग पहिला 

© डॉ. जयंत गुजराती

नासिक

मो. ९८२२८५८९७५

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ आंदोलनं  झोक्याची–झेप फिनिक्सची –  भाग -2 ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई ☆

सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

? इंद्रधनुष्य ?

आंदोलनं  झोक्याची–झेप फिनिक्सची – भाग-2 ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई ☆

(मागील भागात आपण पाहिले- माहेरचे लोक त्यांना “आता इकडेच रहा ” म्हणत होते. तेव्हा सीताबाईंनी निक्षून सांगितलं , “मुंबईचं माझं घर हक्काचं होतं , ते काळानं हिरावून नेलं .आता मी कोल्हापूरच्या घरात राहिले तर, सासर आणि माहेर अशी मला दोन घर मिळतील. दोन्हीकडे मी राहू शकेन. पण माहेरीच राहिले तर सासर तुटेल “. एक बुद्धिमान स्त्रीच इतका विचार करू शकेल. आता इथून पुढे )            

मौजमजेच माहेरपण आठ-दहा दिवसाच छान असतं. पण अशा अवस्थेतलं माहेरपण त्यांना नकोसं वाटायला लागलं . सीताबाईंचे सासरे केशवराव, आपल्या सुनेच्या अंगातली हुशारी कर्तबगारी ओळखून होते. अंबू त्यांची लाडकी नात होती . एके दिवशी घरात तसे सांगून, सुनेला आणि नातींना  माहेरून आणायला  ते स्वतःच गेले. सीताबाईंना यावेळी सासरी आल्यावरच बरं वाटलं. सासूबाई सावत्र. त्यांना मनापासून ही जबाबदारी नको होती. पण त्या काही बोलू शकत नव्हत्या. सीताबाईंवर अनेक बंधन आली. काळच तसा होता तो. स्वयंपाक सोळ्यातला . तेथेही त्यांना मज्जव. पाणी हवं असलं तरी पाण्याला शिवायचं नाही. मुलींकडून मागून पाणी घ्यायचं. कोणी आलं तरी तिने पुढे जायचं नाही.  केर- वारे,  चूल ,पोतेरे, दळण, कांडण , निवडण हीच काम त्यांनी करायची. 19 –20 वर्षांची , ऐन तारुण्यातली विधवा असा डाग लागला होता तिला. कोणीही सीताबाईंना तिरकस बोललेलं सासऱ्यांना मात्र आवडायचं नाही.

मुली कधी मोठ्या होणार ? या सतत पडणाऱ्या प्रश्नाचे उत्तर सीताबाईंना हळूहळू मिळायला लागलं. सगळेच दिवस सारखे नसतात. कोणी , कोणी मदतीसाठी, कोणाच्या बाळंतपणासाठी, कामासाठी सीताबाईंना बोलवायचे. पण सासरे स्पष्टपणे नकार द्यायचे. आता मुलीही थोड्या मोठ्या झाल्या. आजोबांच्या लाडक्या होत्या त्या. आता झोका हळूहळू दुरुस्त झाला. त्याला ऊर्जा मिळायला लागली . वेळ मिळेल त्यातून सीताबाई मुलींचा अभ्यास घ्यायला लागल्या. शिकविण्यातली आत्मीयता आणि मुलींची हुशारी सासऱ्यांच्या नजरेतून  सुटली नाही. एके दिवशी त्यांनी सीताबाईंना सांगितलं, ” फक्त काम काम आणि घर अशा कुंपणात राहून, तू तुझं आयुष्य खर्ची घालू नको. शेजारची आणखी चार-पाच मुलं आली तर त्यांनाही शिकव. आणि तसंच झालं. आणखी चार-पाच मुलांना शिकवणं सुरू झालं. आता झोक्याला आणखी ऊर्जा मिळायला लागली . सीताबाई मुलांना, अभ्यासाबरोबर स्तोत्रं, नैतिकतेचे धडे, सणांच महत्व, त्या सणांशी जोडल्या गेलेल्या आख्यायिका अगदी रंगवून रंगवून सांगायच्या. मुलांबरोबर पालकही खुश होते. त्यांच्या शिकवण्याची ख्याती सर्वत्र पसरायला लागली. मुलांची संख्या वाढायला लागली. सीताबाईंना शिकविताना हुरूप वाटायला लागला. शिकविताना त्या रंगून जायला लागल्या. दुःखातलं मन दुसरीकडे वळायला लागलं. सर्वजण त्यांना बाई ,बाई म्हणता म्हणता       ” शाळेच्या आई ” असंच म्हणायला लागले. आता त्या खऱ्या अर्थाने “शाळेच्या आई”, झाल्या. घरातल्या सोप्याचं  रुप पालटून त्याला शाळेत स्वरूप आलं. ” नूतन ज्ञानमंदिर “, अशी पाटी लागली. आता एक मदतनीसही त्यांनी घेतल्या. आता झोका उंच उंच जायला सुरुवात झाली . शिकवत असताना, सीताबाईंना नवनवीन कल्पना सुचायला लागल्या .संक्रांतीला मुलांना हातात तिळगुळ देण्यापेक्षा, अगदी दीड दोन इंचाच्या, वेगवेगळ्या आकाराच्या रंगीत रंगीत कापडी पिशव्या, कल्पकतेने शिवून, त्यातून मुलांना त्या पिशव्यातून तिळगुळ द्यावा, अशा कल्पनेला त्यांनी मूर्त स्वरूप दिलं. वेगवेगळ्या आकाराच्या पिशव्या बघून मुलं ही खुष व्हायची. शाळेचं  गॅदरिंग म्हणजे पर्वणी असायची. पालक, विद्यार्थी उत्साहाने, आनंदाने भारून गेलेले असायचे. शिवणकाम , विणकाम , संगीत, काव्य लेखन,  नाट्य लेखन या सर्वांबरोबर कार्यक्रमाचे नियोजन, यात सीताबाईंचा हातखंडा होता. सीताबाई –शाळेच्या आई, स्वतः गाणी तयार करून, मुलांकडून बसवून घेत. स्वतःच्या गोड गळ्यातून म्हणत असत. मुलांना स्वतः सजवत असत. कृष्णाचा एक पोषाख तर त्यांनी कायमचा  शिवून ठेवला होता . ध्रुव बाळ, भरतभेट,  राधाकृष्ण,  हनुमान, राम सीता यांच्या नाटिका स्वतः लिहून, मुलांकडून उत्तम अभिनयासहित करून घ्यायच्या. “कृष्णा sss मजशी बोलू नको रे, घागर गेली फुटून”,असा नाच करताना  छान ठेका  धरला जायचा. ” बांधा उखळाला हो, बांधा उखळाला, या नंदाच्या कान्ह्याला बांधा उखळाला.” गाणं चालू झालं की मुलांच्या चेहऱ्यावरचे हावभाव बघून पालक आणि प्रेक्षक यांनाही आनंद व्हायचा . सगळं झालं की मुलांना खाऊ दिला जायचा. छोटी छोटी बक्षीस दिली जायची. हसत हसत मुलं घरी जायची . गोड स्वप्न बघत झोपी जायची. दुसरे दिवशी पालक, शाळेच्या आईंचं कौतुक करून खूप छान छान अभिप्राय द्यायचे. ते ऐकून सीताबाईंना आनंद आणि स्वतः विषयी अभिमान वाटायचा. नवनवीन कल्पनांचा उदय व्हायला लागला. झोक्याला ऊर्जा मिळायला लागली .आणि झोका उंच उंच जायला लागला. सुट्टी सुरू झाली की  त्या माहेरी जात. तेथेही आलेल्या भाचरांचं नाटक, गाणी , नाच तयार करून ,अगदी पडदे लावून, शेजार  पाजार्‍यांना बोलावून गॅदरिंग घ्यायच्या. वेगवेगळ्या स्पर्धा घेऊन बक्षीस द्यायच्या . भाचरं आनंदात असायची. त्यांना आत्या हवीहवीशी वाटायची . कोणावरही येऊ नये असा प्रसंग सीताबाईंवर आला. आईचीच दोन बाळंतपणं त्यांना करावी लागली. एका तरुण विधवा मुलीला आईचे बाळंतपण करताना आणि आईला करून घेताना मनाला काय यातना झाल्या असतील त्या शब्दात सांगणे कठीण आहे.

बघता बघता सीताबाईंनी समाजकार्यालाही सुरुवात केली. प्रौढ शिक्षण, स्त्री शिक्षणाची आता पहाट व्हायला लागली होती . अनेक स्त्रियांना साक्षरतेचा आनंद त्यांनी मिळवून दिला. स्वदेशीचा पुरस्कार आणि परकीय कपड्यांवर बहिष्कार म्हणून टकळीवर सुतकताई त्यांनी सुरू केली.

सासर्‍यांचा भक्कम आधार, धाकट्या जावेची मदत, शाळेतल्या गोड चिमुकल्यांच्या सहवासाचा विरंगुळा आणि आनंद, स्वतःची ध्येयनिष्ठा आणि कष्ट , श्री अंबाबाईचा वरदहस्त आणि अखेर नियती या सर्वांच्या एकत्रित ऊर्जेने  झोक्याचे आंदोलन उंच उंच होत गेले . त्या उंच गेलेल्या झोक्याकडे सगळेजण आश्चर्याने पाहत राहिले. अरे वा ss वा, वा ss वा खूपच कौतुकास्पद ! सीताबाईंना आनंदाची आणि उत्साहाची ऊर्जा मिळाली. आणि त्या, ” घरात हसरे तारे असता sas, ”  या गाण्याचा चालीवर स्वतःच्या शब्दात  गाणे गुणगुणायला लागल्या.

मी पाहू कशाला कुणाकडे, मी पाहू कशाला जगाकडे.

घरात ज्ञान मंदिर असता, मी पाहू कशाला कुणाकडे.

    गोड चिमुकली गोजिरवाणी.

    हसती खेळती गाती गाणी.

     मला बिलगती आई म्हणुनी.

उंच माझा झोका पाहता, आनंदाचे उडती सडे.

मी पाहू कशाला कुणाकडे , मी पाहू कशाला जगाकडे.

– समाप्त –

(सत्य घटनेवर आधारित कथा)

  ©  सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

बुधगावकर मळा रस्ता, मिरज.

मो. ९४०३५७०९८७

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ आंदोलनं  झोक्याची–झेप फिनिक्सची –  भाग -1 ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई ☆

सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

? इंद्रधनुष्य ?

आंदोलनं  झोक्याची–झेप फिनिक्सची – भाग-1 ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई ☆

श्रावण महिना. नागपंचमीचे दिवस . छान गोड हिरवाईचा पसरलेला सुगंध, मोठ्या वडाच्या झाडाला ,एका मोठ्या फांदीला, एक मोठा झोका बांधलेला होता. मुली झोका खेळत होत्या. झोका उंच उंच चढवत होत्या.  झोका जास्त उंच जायला लागल्यावर मात्र बाजूला  उभ्या असलेल्या बघ्यांचा दंगा, आरडा ओरडा चालू व्हायचा. झोका खाली यायला लागल्यानंतर मात्र मुलींना पोटात खड्डा पडल्यासारखं व्हायचं. झोक्याबरोबर सगळेच छान रंगले होते . सगळं दृश्य मी गॅलरीत बसून पाहत होते. झोक्याची ती आंदोलनं पहात असताना, मला सीताबाई म्हणजे, पूर्वाश्रमीच्या ‘ हेमवती ‘ या एका कर्तबगार स्त्रीने , उंच झोक्याचे स्वप्न पाहिले होते, त्याची आठवण झाली . सांगलीची हेमवती ही भावंडाची सर्वात मोठी बहीण. तिच्या व्यक्तिमत्त्वाचं वर्णन करायला शब्द अपुरे पडावेत असं रूप ! चेहऱ्यावर एक प्रकारच्या टवटवीतपणाचं सौंदर्य, सुडौल बांधा , विपूल केश संभार, आत्मविश्वासू वृत्ती, आणि तडफदार भाषा असंच व्यक्तिमत्व होतं तिचं. मुलींनी जास्त शिक्षण घेणं , त्या काळातल्या समाजाला मान्य नव्हतं . काळच वेगळा होता तो.  हेमवतीच चौथीपर्यंतच शिक्षण झालं. आता शिक्षण भरपूर झालं ,पुरे आता शिक्षण, असा घरात विचार सुरू झाला. हेमवती अभ्यासू वृत्तीची,   हुशार, नवनवीन खाद्यपदार्थ शिकण्याची आवड, शिवणकाम, विणकाम, भरतकाम ,सगळ्या कला पुरेपूर अंगी बांणलेल्या होत्या.

हेमवती आता 13 -14 वर्षाची झाली . म्हणजे काळानुसार उपवर झाली . स्थळं बघायला सुरुवात झाली. कोणीतरी कोल्हापूरच्या मुलाचं सुयोग्य वर म्हणून स्थळ सुचवलं . मुलगा रामचंद्र  हा मुंबईला पोस्टात अधिकारी पदावर नोकरीला होता. कोल्हापूरला स्वतःचं घर, घरात सासू-सासरे , दीर, असं घर भरलेलं होतं  आणि सर्वात भावलं म्हणजे श्री अंबाबाईच्या वासाचं पवित्र तीर्थक्षेत्र — दक्षिणकाशी  अस कोल्हापूर.

दोन्हीकडूनही नकार देण्यासारखं काहीच नव्हतं. पसंता पसंती झाली.  लग्न ठरलं. आणि झालंही.  रामचंद्र यांनी आपल्या नावाशी अनुरूप असं पत्नीचं नाव ‘सीता ‘ असं ठेवलं.’ हेमवती’ आता ‘ सीताबाई ‘ झाल्या.

रामचंद्र आणि सीताबाईंचा मुंबईला आनंदाने संसार सुरू झाला. माहेरी दहा-बारा जणांच्या कुटुंबामध्ये राहिलेल्या, सीताबाईंना , मुंबईला प्रथम एकाकीपणा वाटायला लागला. पण नंतर त्या लवकरच छान रुळल्या . काही दिवसातच  पाळणा हलला आणि कन्यारत्न झाले .खरोखरच  ‘रत्न ‘ म्हणावी अशीच गोरीपान , सुंदर , घारे डोळे अगदी तिच्याकडे पहात रहावं असं रूप! सासरच्या घरातली पहिली नात. कोल्हापूरची म्हणून अंबाबाई असं नामकरण झालं. सर्वजण तिला अंबू म्हणत. सीताबाई अनेकदा कन्येच्या सौंदर्याकडे पहात रहात आणि माझीच नाही ना दृष्ट लागणार हिला , असं म्हणून तिच्या गालावरून हात फिरवून बोट मोडायच्या. अंबू साडेतीन वर्षाची झाली आणि सीताबाईंना बाळाची चाहूल लागली . आता बाळंतपणासाठी सासरी, कोल्हापूरला आल्या. दुसरी कन्या झाली . अंबुची बहीण म्हणून ही सिंधू ! दोघेही खूप विचारी होते. त्यामुळे दोघेही नाराज नव्हते. बाळाला तीन महिने होत आले. आता बाळ बाळंतिणीला मुंबईला घेऊन जावे, या विचाराने रामचंद्र कोल्हापूरला आले. दोन दिवसांनी निघायची तयारी झाली . सामानाची बांधाबांध झाली.

सगळ्या गोष्टी सरळपणान होऊन, त्यांना आनंद मिळू देणं नियतीला मान्य नव्हतं. सगळं उलटं पालटं झालं. रामचंद्रना हार्ट अटॅक आला . आणि त्यातच त्यांना देवाज्ञा झाली. सीताबाई खोल गर्तेत गेल्या. आभाळ कोसळलं त्यांच्यावर . घरदार दुःख सागरात बुडाले. कोणाला काहीच सुचेना. बाळाला तर वडील कळण्यापूर्वीच नियतीने हिरावून नेलं. वर चढलेला झोका खाली येणारच, पण खाली येताना पोटात खड्डा पडला. आणि झोका मोडूनच पडला.

दुःखद बातमी मुंबईच्या ऑफिसला कळवली गेली. तिकडे सामान आणायला जी व्यक्ती गेली , ती दोन-तीनच  वस्तू घेऊन आली. बाकी सामानाचं काय झालं , ही गोष्ट कोण कोणाला विचारणार! ती विचारण्याची वेळही नव्हती. आता पुढे काय? हे प्रश्नचिन्ह प्रत्येकासमोर उभे होते. दिवस वार झाल्यानंतर माहेरच्यांनी विचारणा करून , बदल म्हणून सीताबाईंना माहेरी घेऊन गेले. आपल्या मुलीला सावत्र सासूजवळ कशी वागणूक मिळेल याची काळजी होती. सीताबाई माहेरी दोन अडीच महिने राहिल्या. एरवी माहेरी जाण्यातला आणि रहाण्यातला आनंद वेगळा आणि आताचं माहेरपण म्हणजे,  नाराजीचे सूर आणि अश्रूंचा पूर , असं चित्र होतं. सतत कोणी ना कोणी समाचाराला यायचं. त्यांचे वेगवेगळे उपदेश ऐकायला लागायचे. सीताबाईंना कोणी, मुलीचा पायगुण म्हणायचे. मुलीची काय  चूक असं त्यांना वाटायचं. आणि डोळ्यातून अश्रू धारा वहायला लागायच्या. सीताबाई विचार करायच्या, -“त्या सीतामाईला वनवासात श्रीरामासारख्या पतीचा भक्कम आधार होता. पण मी ही सीता मात्र दोन लहान मुलींना घेऊन हाताशपणे उभी आहे. माझं काय चुकलं असेल बरं?  रामचंद्रना देवाने अशा आनंदातल्या संसारातून उचलून का नेलं असेल बरं? अनेक प्रश्न , अनेक विचार मनात गर्दी करायचे. पण त्या प्रश्नांना अजून उत्तर सापडत नव्हतं. माहेरचे लोक त्यांना “आता इकडेच रहा ” म्हणत होते. तेव्हा सीताबाईंनी निक्षून सांगितलं , “मुंबईचं माझं घर हक्काचं होतं , ते काळानं हिरावून नेलं .आता मी कोल्हापूरच्या घरात राहिले तर, सासर आणि माहेर अशी मला दोन घर मिळतील. दोन्हीकडे मी राहू शकेन. पण माहेरीच राहिले तर सासर तुटेल “. एक बुद्धिमान स्त्रीच इतका विचार करू शकेल.

– क्रमशः भाग पहिला 

 ©  सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

बुधगावकर मळा रस्ता, मिरज.

मो. ९४०३५७०९८७

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ सामान्य ब्राह्मणांची असामान्य दानत… लेखक : डॉक्टर नील वाघमारे ☆ संग्राहक – श्री माधव केळकर ☆

?इंद्रधनुष्य?

 ☆ सामान्य ब्राह्मणांची असामान्य दानत…लेखक : डॉक्टर नील वाघमारे ☆ संग्राहक – श्री माधव केळकर ☆

आज संध्याकाळी इस्रो चंद्राच्या पृष्ठभागावर सुरक्षित आणि सॉफ्ट लँडिंगचे प्रक्षेपण करेल.

आपण सर्वजण या महत्त्वपूर्ण प्रसंगाचे साक्षीदार होऊ.

या पार्श्वभूमीवर, इस्रोच्या आर्मीत असलेल्या एका हिऱ्याची गोष्ट शेअर करायची आहे.  त्यांचे नाव श्री भरत कुमार के, इस्रोचे वरिष्ठ शास्त्रज्ञ…

कोळशाच्या खोल खाणीत पडलेला हा हिरा श्री रामदास जोगळेकर आणि त्यांच्या वहिनी सौ वनजा भावे यांनी भिलाई (छत्तीसगड) जवळील चारोडा गावातून 10’x 10’ च्या झोपड्यातून शोधून काढला.  गावाच्या आजूबाजूला कोळसा आणि लोखंडाच्या खाणी आहेत आणि तिथे तासभर उभे राहिल्यास कोळशाला हात लावला नाही तरी तुमचे कपडे काळे होतील अशी परिस्थिती आहे….

श्री जोगळेकर आणि श्रीमती भावे यांना कळले की सेंट्रल स्कूल, भिलाई मार्शलिंग यार्डमधील एका मुलाने गणित आणि भौतिकशास्त्रात 99% आणि रसायनशास्त्रात 98% गुण मिळवले आहेत आणि त्याला इंजिनीअरिंग करायचे आहे, तेव्हा ते त्याला भेटण्यासाठी आणि त्याला पाठिंबा देण्यासाठी गेले. त्यांना त्या मुलामध्ये ‘स्पार्क’ दिसला आणि त्यांनी त्याच्या आयआयटी कोचिंगची फी भरली.

मुलाने आयआयटी धनबादमध्ये प्रवेश मिळवला त्याची फी देखील दोघांनी भरली आणि श्री. भरत कुमार के हा टॉपर होता आणि मेकॅनिकल इंजिनीअरिंगमध्ये 8 पैकी 7 सेमिस्टरमध्ये त्याने सुवर्णपदक जिंकले!!

आयआयटी धनबादमधून कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये SAIL ने सिलेक्ट केलेला तो एकमेव कॅन्डीडेट होता आणि फायनली 2019 मध्ये  इस्रो ने त्याची निवड केली.

त्यांचे वडील सुरक्षा रक्षक आहेत आणि आई खाणीतील कामासाठी वाट पाहत असलेल्या रोजंदारी कामगारांना इडली विकते.

श्री भरत कुमार के आणि त्यांच्या पालकांना सलाम.  कोळशाच्या खाणीतून हिरा शोधून तो चमकदार बनवण्याचे श्रेय श्री जोगळेकर आणि श्रीमती भावे यांना जाते. त्या दोघांनाही नमन….

लेखक : डॉक्टर नील वाघमारे

संग्राहक : श्री माधव केळकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ पांडवकालीन किरीट… ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

? इंद्रधनुष्य ?

☆ पांडवकालीन किरीट… ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

दीपावली लक्ष्मीपूजन व सोमवती अमावस्येनिमित्त श्री त्र्यंबकेश्वर ज्योतीर्लिंग मंदिरात दुर्मिळ असा प्राचीन रत्नजडीत मुकूट व सुवर्ण मुखवटा भाविकांना दर्शनासाठी ठेवण्यात आला होता. या मुकुटाला स्थानिक जन पांडवकालीन किरीट संबोधतात.

हा मुकूट अत्यंत मौल्यवान असून आजच्या बाजारभावानुसार सोने व रत्नांच्या किंमतीचा विचार करता त्याचे मुल्य २०० कोटी रुपयांपेक्षा जास्त असू शकते, मात्र त्याचे प्राचीनत्व लक्षात घेता हा मुकूट अत्यंत अमोल आहे. या मुकुटाचे उल्लेख सहाशे वर्षांपूर्वीच्या कागदपत्रात सुद्धा सापडतात.

शुद्ध सोन्याच्या या मुकुटाचे तीन भाग असून देशविदेशातील अत्यंत दुर्मिळ व मौल्यवान रत्ने जडविलेली आहेत. पैलू न पाडलेले हजारो अतिदुर्मिळ गुलाबी हिरे, पाचू, माणिक, पुष्कराज, श्रीलंकेतील नीलम, अति मूल्यवान बसरा मोती या मुकुटावर जडवलेली आहेत. मुकुटाच्या आतील बाजूवर प्राचीन कन्नड लिपीत अक्षरे कोरलेली आहेत.

असा हा अतिशय मौल्यवान मुकुट सुर्याजी त्रिंबक प्रभुणे या मराठा सरदाराने इसवी सन १७४०मध्ये त्र्यंबकगडावरील विजयाप्रित्यर्थ श्री त्र्यंबकराजाच्या चरणी अर्पण केला. हा मुकुट पूर्वी म्हैसूरच्या राजघराण्याच्या मालकीचा होता. त्यांच्याकडून तो मोगलांनी लुटला. नंतर मराठ्यांनी दिल्ली काबीज केल्यानंतर अनेक जडजवाहिरांसमवेत तो पेशव्यांच्या खजिन्यात दाखल झाला व नंतर वर उल्लेख केल्याप्रमाणे त्र्यंबकेश्वराच्या पदरी आला. मंदिराच्या खजिन्यात असल्यामुळेच इसवी सन १८२० मध्ये ब्रिटीशांनी त्र्यंबकच्या केलेल्या लुटीतून तो बचावला. 

या मुकूटासोबतच पेशव्यांनी पंचमुखी सुवर्णमुखवटाही श्री त्र्यंबकेश्वरास अर्पण केला. हा मुखवटाही शुद्ध सोन्याचा असून तब्बल साडेनऊ किलो वजनाचा आहे. हा मुखवटा दर सोमवारी कुशावर्त तीर्थात स्नान झाल्यानंतर नगरप्रदक्षिणेदरम्यान पालखीतून मिरवला जातो. भाविक दुतर्फा उभे राहून दर्शन घेतात.

संग्राहक : श्री सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ श्रीमद्‌भगवद्‌गीता – अध्याय दुसरा – (श्लोक ५१ ते ६०) – मराठी भावानुवाद ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

डाॅ. निशिकांत श्रोत्री 

? इंद्रधनुष्य ?

☆ श्रीमद्‌भगवद्‌गीता — अध्याय अध्याय दुसरा – (श्लोक ५१ ते ६०) – मराठी भावानुवाद ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

संस्कृत श्लोक… 

कर्मजं बुद्धियुक्ता हि फलं त्यक्त्वा मनीषिणः । 

जन्मबन्धविनिर्मुक्ताः पदं गच्छन्त्यनामयम्‌ ॥ ५१ ॥ 

प्रज्ञावान करिती त्याग फल जे कर्मप्राप्त

जन्ममरण मुक्ती सहजी परमपद होते प्राप्त ॥५१॥

यदा ते मोहकलिलं बुद्धिर्व्यतितरिष्यति । 

तदा गन्तासि निर्वेदं श्रोतव्यस्य श्रुतस्य च ॥ ५२ ॥ 

मोहपङ्का तरून जाता तव बुद्धी सुखरुप

इह-परलोकीच्या भोगप्रती वैराग्य तुला प्राप्त   ॥५२॥

श्रुतिविप्रतिपन्ना ते यदा स्थास्यति निश्चला । 

समाधावचला बुद्धिस्तदा योगमवाप्स्यसि ॥ ५३ ॥ 

विचल तव बुद्धी अचल होता परमात्म्या ठायी

एकरूप तू शाश्वत होशिल परमात्म्या ठायी ॥५३॥

अर्जुन उवाच 

स्थितप्रज्ञस्य का भाषा समाधिस्थस्य केशव । 

स्थितधीः किं प्रभाषेत किमासीत व्रजेत किम्‌ ॥ ५४॥

कथित अर्जुन 

परमात्मा प्राप्त स्थितप्रज्ञ केशवा कोणा म्हणावे

तो कसा बोलतो, बैसतो, चालतो हे मज सांगावे ॥५४॥

श्रीभगवानुवाच 

प्रजहाति यदा कामान्सर्वान्पार्थ मनोगतान्‌ । 

आत्मन्येवात्मना तुष्टः स्थितप्रज्ञस्तदोच्यते ॥ ५५ ॥ 

कथित श्री भगवान

पूर्णत्याग करुनी मनीच्या सर्व कामनांचा

आत्म्यात रत राहणे भाव स्थितप्रज्ञाचा ॥५५॥

दुःखेष्वनुद्विग्नमनाः सुखेषु विगतस्पृहः । 

वीतरागभयक्रोधः स्थितधीर्मुनिरुच्यते ॥ ५६ ॥ 

सुखातही निस्पृह दुःखात  ना उद्विग्न

असा स्थितप्रज्ञ जो वासनाभयक्रोधहीन   ॥५६॥

यः सर्वत्रानभिस्नेहस्तत्तत्प्राप्य शुभाशुभाम्‌ । 

नाभिनन्दति न द्वेष्टि तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता ॥ ५७ ॥ 

सोर्वदा स्नेहरहित शुभप्राप्ती नाही प्रसन्न 

अशुभाने ना दुःखी असे तो स्थितप्रज्ञ ॥५७॥

यदा संहरते चायं कूर्मोऽङ्गानीव सर्वशः । 

इन्द्रियाणीन्द्रियार्थेभ्यस्तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता ॥ ५८ ॥ 

ज्ञानाने प्रज्ञेसी मोहहीन स्थिर करून 

कच्छावयवांसम घेई जो आकसून 

अपुल्या इंद्रियेच्छा सर्वस्वी आवरून

तयासी हे पार्था स्थितप्रज्ञ ऐसे जाण ॥५८॥

विषया विनिवर्तन्ते निराहारस्य देहिनः । 

रसवर्जं रसोऽप्यस्य परं दृष्ट्वा निवर्तते ॥ ५९ ॥ 

दमन करिता गात्रांचे विषया ये निवृत्ती

आसक्तीस परि विषयांप्रत ना ये निवृत्ती

अनुभूतीने परमेशाच्या स्थितप्रज्ञा निवृत्ती 

भोगासह त्यांना रुचीतही प्राप्त हो निवृत्ती ॥५९॥

यततो ह्यपि कौन्तेय पुरुषस्य विपश्चितः । 

इन्द्रियाणि प्रमाथीनि हरन्ति प्रसभं मनः ॥ ६० ॥ 

शमन न होता आसक्तीचे त्रस्त गात्र स्वभावे

मना शांतता मुळी न लाभते कितीही यत्न करावे

बळे इंद्रिये भुलविती मानस बुद्धिमान मनुजाचे

कौंतेया जाणुनी घेई महत्व आसक्तीच्या दमनाचे ॥६०॥

– क्रमशः भाग दूसरा

अनुवादक : © डॉ. निशिकान्त श्रोत्री

एम.डी., डी.जी.ओ.

मो ९८९०११७७५४

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ परकीय युद्धभूमीवरचं भारतीय शौर्यगीत ! – मेजर समरपाल सिंग तूर !… भाग – ३ ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

☆ परकीय युद्धभूमीवरचं भारतीय शौर्यगीत ! – मेजर समरपाल सिंग तूर !… भाग – ३ ☆ श्री संभाजी बबन गायके 

(साहेबांनी त्या पळपुट्यांकडे पाहून असे काही म्हटले की त्यापैकी दोन साधे शिपाई परतले आणि म्हणाले… “साब… अब हम आपके अंडर हैं… आप जो कहेंगे वो करेंगे!” त्यांचा अधिकारी मात्र तिथून पळून गेला तो गेलाच.) इथून पुढे —  

समरपाल सिंग साहेबांनी आपल्या आडोशाच्या वर थोडेसे डोके वर काढण्याचा प्रयत्न केला. तेंव्हा त्यांच्या शेजारचा राजपूत सैनिक, जो खरं तर वयाने मोठा पण अधिकाराने कमी स्तरावरचा होता… समरपाल सिंग साहेब त्याचे वरिष्ठ होते, खास राकट आवाजात म्हणाला, ”साब जादा उछलो मत! ये आपका नीला हेल्मेट उनको दिखेगा तो टरबुजे की तरह फट जाओगे!” तो बिचारा आपल्या या साहेबाच्या काळजीपोटी तसं म्हणून गेला होता. साहेब म्हणाले, “अरे भाई, देखने तो दो दुश्मन है कौन और कितने!”   

साहेबांनी आदेश दिला, “एक गोली… एक दुश्मन!” गोळी वाया जाता कामा नये! 

समरपालसिंग साहेबांनी रायफल तयार केली… आपला नेताच आपल्या खांद्याला खांदा लावून लढणार म्हटल्यावर त्या राजपुतांना आणि तिथल्या इतर सैनिकांना भलताच चेव चढला. 

आता बंडखोर अगदी नजरेच्या टप्प्यात दिसत होते. त्यांचे ते लालबुंद डोळे.. दारूच्या नशेत तर्र हजारो यमदूत पुढे पुढे येताहेत…. त्यांना त्यांचे विरोधक संपवून टाकायचे होते… आणि मध्ये येणाऱ्या शांतिसैनिकांनाही ते ठार मारायला तयार होते! 

शेजारच्या राजपुताने आपली रायफल लोड करीत करीत साहेबांकडे डोळे मोठे करून पाहिले… डोळे सांगत होते जणू…. ‘अब समय आ गया है…. मारेंगे तो साथ साथ… मारते मारते मरेंगे तो साथ!’ साहेबांनीही डोळ्यांनीच हुंकार भरला… उजव्या हाताची मूठ बंद केली आणि ‘जरूर’ अशा अर्थाने अंगठा वर करून दाखवला…

कुंपणापलीकडून यमदूत पुढे पुढे सरकत होते… त्यांचे लालबुंद डोळे भिरभिरत होते… सावज शोधत होते… आपल्या बहादुरांनीही त्या मृत्यूच्या डोळ्यांत डोळे घालून पाहण्याचे धाडस सुरू केले….. आपल्याही सैनिकांच्या नजरा म्हणत होत्या… तु एकदा ट्रिगर तर दाबून बघ रे…… एक गोळी तर झाडून पहा आमच्या दिशेने… मग पहा आमच्या गोळीचा निशाणा! 

दिवसभर गोळीबार सुरू होता…. आपला एकही भारतीय सैनिक जागचा हलला नाही… कुणीही जीवाच्या भीतीने पळून गेलं नाही… शत्रू टप्प्यात येताच त्याला अचूकपणे टिपले जात होते….. 

दिवस संपता संपता हल्लेखोरांचा एक प्रतिनिधी शिबिरापर्यंत बोलणी करण्यासाठी म्हणून आला. ‘शिबिरात आश्रय घेतलेल्या त्या छत्तीस जणांना आमच्या हवाली करा… आम्ही माघारी जाऊ!’ त्याने अट ठेवली.  

समरपाल सिंग साहेब म्हणाले…. “शरणार्थ्यांना मृत्यूच्या हवाली करणं आमच्या तत्वात बसणारं नाही….” प्रतिनिधी परतला. 

रात्र झाली. आपल्या सैनिकांपैकी कुणाच्याही डोळ्याला डोळा लागला नव्हता! सकाळी त्या बंडखोरांनी एकदम तोफगोळे डागायाला आरंभ केला! साहेबांच्या सैन्याने जोरदार उत्तर द्यायला आरंभ केल्याने हल्लेखोर मागे सरकू लागले.. 

पण एक चमत्कारच झाला म्हणायचा. नदीच्या तीरावर असलेल्या आपल्या सैनिकांच्या तुकडीच्या गोळीबाराच्या टप्प्यात हे मागे सरकत असलेले बंडखोर आपसूक आले. त्यांचे आता सॅंडविच झाले होते. आपल्या त्या सैनिकांनी समरपाल सिंग साहेबांना संदेश दिला… ‘साहेब… शत्रू आमच्या टप्प्यात आलाय… तुम्ही बंकरमध्ये लपून रहा… आम्ही इकडून गोळीबार करू….’ आणि त्यांनी तसे केलेसुद्धा. त्यात कित्येक बंडखोर रक्ताच्या थारोळ्यात पडले! उरलेले बंडखोर मग आता शिबिराच्या दिशेने पळाले.

मग समरपाल सिंग साहेबांनी आपल्या या नदी तीरावरल्या सैन्याला आदेश दिला… “तुम्ही गोळीबार थांबवा… आडोसा घ्या… आता आम्ही इकडून गोळीबार सुरू करतो!” मग… ‘एक गोली एक दुश्मन’ असा हिशेब सुरू होता तो पुढे सुरू झाला…. केवळ छत्तीस भारतीय जवानांनी अनेक बंडखोरांचा निकाल लावला होता…

शिबिरात असलेले अधिकारी, शरणार्थी जीव मुठीत धरून होते! मदत आली काही तासांनी, पण ती सुद्धा अगदी तुटपुंजी आणि अप्रशिक्षित सैनिकांची. 

इतका वेळ समरपाल साहेबांचे गाढे वीर खिंड लढवतच राहिले होते! या धुमश्चक्रीत आपले दोन वीर कामी आले! सुभेदार धर्मेश संगवान (८,राजपुताना रायफल्स) आणि आर्मी मेडिकल कोअरचे सुभेदार कुमार पाल सिंग हे ते दोन हुतात्मा जवान! अमेरिकन महिला लष्करी अधिकारी आणि आणखी काही जणांना तेथून सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले.

या प्रचंड संघर्षानंतर भारतीय तुकडीला माघारी फिरण्याचा आदेश मिळाला! आपले सैनिक शब्दाला, कर्तव्याला प्राणांची बाजी लावून जागले होते….. युद्ध कुठेही असो…. आमचा लढाऊ बाणा कायम असतो… हेच त्यांनी जगाला दाखवून दिले.

संयुक्त राष्ट्रसंघाने भारतीय सैन्याचा नेहमीच गौरव केला आहे. काहीच काळापूर्वी आपल्या एक हजार जवानांना संयुक्त राष्ट्र संघाने खास स्मृतिचिन्हे देऊन त्यांना सन्मानीत केले आहे… आजही आपले शेकडो सैनिक आणि अधिकारी आंतरराष्ट्रीय शांतिसेनेमध्ये तैनात आहेत… तिथेही ‘भारत माता की जय!’ घोषणा गुंजत असतात! भारतीय सोनं जगातल्या कोणत्याही आगीत घातलं तरी तेजानेच चकाकतं!  

युद्ध भयावह असतं… पण त्याला सैनिकांचा इलाज नसतो… त्यांना फक्त कर्तव्य पार पाडणं माहित असतं.. नव्हे, त्यासाठीच त्यांना प्रशिक्षण दिलेले असते. आणि याबाबतीत भारतीय सैनिकांची बरोबरी इतर फारसे कुणी करू शकत नाही… कारण आपले सैनिक एकमेवाद्वितीय आहेत… आपलं सैन्य देशाशी इमान राखणारं आहे…  प्राणांची आहुती देऊनही!

कॅप्टन हुद्द्यावरून नंतर मेजर हुद्दा प्राप्त समरपाल सिंग साहेब आता सेवानिवृत्त आहेत. त्यांच्या आफ्रिकेतील अनुभवाविषयी इंटरनेटवर खूप काही वाचण्या, ऐकण्यासारखं, पाहण्यासारखं आहे.

मेजर गौरव आर्य (सेवानिवृत्त) नावाचे एक माजी लष्करी अधिकारी सुद्धा विडीओजच्या माध्यमातून आपल्या सैनिकांविषयी भरभरून आणि अभ्यासपूर्ण सांगत असतात.. धन्यवाद! 

इंग्लिश आणि हिंदीत असलेली ही माहिती आपल्या मराठी वाचकांसाठी मी जमेल तशी मराठीत लिहिली आहे… यात माझे स्वत:चे काही नाही. तपशील, नावे, घटनाक्रम, यांत काही तफावती असू शकतात…. पण त्यातील आशय नक्कीच महत्त्वाचा आहे. 

नऊ जुलै हा दक्षिण सुदानचा स्वातंत्र्यदिन…. त्यांच्या स्वातंत्र्यासाठी जीवाची बाजी लावणाऱ्या आपल्या भारतीय सैनिकांविषयी या दिवसाच्या निमित्ताने लिहिलेला हा लेख सविनय सादर. 

– समाप्त –

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ परकीय युद्धभूमीवरचं भारतीय शौर्यगीत ! – मेजर समरपाल सिंग तूर !… भाग – २ ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

☆ परकीय युद्धभूमीवरचं भारतीय शौर्यगीत ! – मेजर समरपाल सिंग तूर !… भाग – २ ☆ श्री संभाजी बबन गायके 

(सैनिक बलिदानासाठीच तर निर्माण झालेला असतो.. इथं भावनांपेक्षा कर्तव्यच श्रेष्ठ !) – इथून पुढे —

आफ्रिकेतील मोहिम वाटते तितकी सोपी नाही… शांतता रक्षणासाठी प्रसंगी प्राणांचे बलिदानही द्यावे लागणार याची जाणीव प्रत्येक जवानाला होती!

८,राजपुताना रायफल्सचे जवान दक्षिण सुदान मध्ये उतरले. विशिष्ट गणवेश आणि डोक्यावर यु.एन. लिहिलेलं निळ्या रंगाचे हेल्मेट. भारतासह अनेक देशांचे सैन्य तिथे तैनात होते. हे संयुक्त सैन्य असते आणि या सैन्याचे नेतृत्व संयुक्त राष्ट्र संघाने नेमलेल्या लष्करी अधिकाऱ्याच्या हाती असते.

भारतीय सैनिकांची संख्या अर्थातच लक्षणीय असते आणि कामगिरी तर अतुलनीय असतेच असते. कारण भारतीय सैनिक अत्यंत कणखर मनोवृत्तीचे, शिस्तबद्ध आणि नैतिकतेचे पालन करणारे, उच्च दर्जा प्रशिक्षित असतात. देशाने सोपवलेली कामगिरी कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करणे हे कर्तव्य मानले जाते आणि हे कर्तव्य प्राणांच्याही पलीकडे जपले जाते. सैनिक आणि अधिकारी आपापल्या बटालियन, रेजिमेंट, तुकडी इत्यादींशी संबंधित व्यक्तींशी, चिन्हाशी, बलिदानाशी अगदी आत्मियतेच्या धाग्यांनी बांधले गेलेले असतात. हे सैनिक एकमेकांचे बंधू असतात. कुणीही कुणाला मागे एकट्याला सोडून पुढे निघून जात नाही. साथ जियेंगे, लडेंगे, मारेंगे और जरुरत पडी तो मरेंगे असा यांचा खाक्या असतो.

दक्षिण सुदानमधील परिस्थिती अत्यंत स्फोटक होती. डिंका आणि नुअर जमातीतले सर्वजण एकमेकांच्या रक्ताचे तहानलेले होते. त्यांनी आजवर एकमेकांच्या टोळीतील लाखो लोकांचा जीव घेतलेला होता.

काहीच दिवसांपूर्वी तिथे एक मोठा सामुहिक नरसंहार घडून आला होता. एक फूटबॉलचे मोठे मैदान भरून जाईल इतके मृतदेह कित्येक दिवस सडत पडले होते. बऱ्याच दिवसांनी मोठ्या क्रेन्स आणून त्याच मैदानावर खड्डे घेऊन ही प्रेतं पुरली गेली!

आंतरराष्ट्रीय प्रयत्नांमुळे या दोन्ही टोळ्यांमध्ये काहीकाळ युद्धविराम झाला होता. डिंका टोळीचा एक नेता अध्यक्ष आणि नुअर टोळीचा एक नेता उपाध्यक्ष अशी व्यवस्था निर्माण केली गेली होती. जागतिक संघटना औषधे, वैद्यकीय सहाय्य, अन्नधान्य इ. मदत करत होत्याच. पण अन्याय होत असल्याच्या आणि सापत्नभावाची वागणूक मिळत असल्याच्या भावनेतून नुअर लोकांनी अचानक डिंका जमातीचा अध्यक्ष असलेल्या सरकारविरुद्ध उठाव केला. हे बंडखोर आणि त्यावेळच्या सरकारी फौजांमध्ये तुफान धुमश्चक्री झाली. हजारो लोक बेघर झाले. जाळपोळ, लुटालुट माजली.

कॅप्टन समरपाल सिंग साहेबांनी गेल्या गेल्या परिस्थितीचा आढावा घेतला. त्यांच्या नेमणूकीच्या भागात एक तात्पुरते शरणार्थी शिबिर त्यांना उभारावे लागले. कारण मारले जाण्याच्या भीतीने डिंका जमातीचे छत्तीस लोक शांतिसेनेच्या आश्रयाला आले होते. त्यांच्या रक्षणाची पूर्ण जबाबदारी आता शांतिसेनेची होती.

बंडखोर आता या शांतिसेनेच्या सैनिकांवरही डूख धरून होते. समरपाल साहेबांनी आपल्या सैनिकांना जबाबदाऱ्या वाटून दिल्या. संयुक्त सेना असल्याने समरपाल सिंग साहेबांच्या हाताखालील तुकडीत आपले छत्तीस भारतीय सैनिक होते. इतर राष्ट्रांतील काही ख्रिस्ती, मुस्लीम सैनिक होते इतर तुकड्यांमध्ये! पण असे असले तरी सच्चे सैनिक दिलेल्या आदेशाचे पालन करण्यात धन्यता मानतात. ह्या सर्वांच्या धार्मिक भावना, आहार, विचार अगदी भिन्न असले तरी आता ते एकाच आदेशाखाली एकत्रित आलेले होते…. आणि मुख्य म्हणजे कर्तव्यासाठी प्राणांची आहुती देण्यास तयार होते.

डिसेंबर महिना. डिंका लोक शांतिसेनेच्या आश्रयाला आल्याची खबर नुअर टोळीला लागली! या डिंकाना ठार मारण्यासाठी या शरणार्थी शिबिरावर सुमारे दीड-दोन  हजार बंडखोर सशस्त्र आक्रमण करणार होते… अशी पक्की खबर मिळाली होती!

यावेळी या शिबिरात शांतिसेनेच्या अमेरिकन महिला वरिष्ठ लष्करी अधिकारी, आणखी काही तीन-चार महत्त्वाच्या व्यक्ती उपस्थित होत्या. मुख्य शहरापासून हे शिबिर पाचशे किलोमीटर्सवर स्थित होते… अर्थातच दारूगोळ्याची कमतरता होती… लगेचच मदत मिळण्याची शक्यता धुसर होती….. आणि या ठिकाणी तैनात सैनिकांची संख्या अगदी तुटपुंजी! आणि शिबिराकडे दीड-दोन हजार सशस्त्र बंडखोर वेगाने झेपावत होते…. जंगली कुत्र्यांची भुकेलेली टोळीच जणू!

शिबिरात असलेला एक विदेशी अधिकारी समरपाल सिंग साहेबांकडे आला आणि म्हणाला, ”माझा फक्त भारतीय सैन्याच्या शौर्यावर विश्वास आहे… इतरांवर नाही! मी त्यांना पळून जाताना पाहिले आहे. तुमच्याकडे असलेल्या रायफल चालवण्याचे प्रशिक्षण मला द्या… मी मेलो तर तुमच्या खांद्याला खांदा लावून लढता लढता मरेन!”

वरिष्ठांची परवानगी घेऊन समरपाल साहेबांनी त्या अधिकाऱ्याला ती रायफल चालवायची कशी हे तिथल्या तिथे शिकवले….. आता आपल्या छत्तीस सैनिकांसोबत हा सदतिसावा सैनिक सज्ज होता!

शरणार्थी शिबिराच्या सभोवती आठ नऊ फूट उंचीचे गवत माजलेले होते. त्यामुळे शिबिराजवळ कुणी येत आहे हे दिसणे अशक्यप्राय होते.

सकाळचे सात वाजताहेत…. आज पहाटेपासूनच समरपाल सिंग साहेब अस्वस्थ आहेत. हल्ला होणार…! आपल्या ताब्यात असलेले शरणार्थी ही आपली जबाबदारी आहे!

समरपाल सिंग साहेब बाहेर आले. शिबिराच्या एका कोपऱ्यात दोन रिकामे कंटेनर एकमेकांवर असेच ठेवून दिले गेले होते. आणि त्यांच्या टोकापर्यंतची उंची आठ फुटांपेक्षा जास्त होती. साहेब त्या कंटेनर्सवर चढले आणि त्यांनी सभोवार नजर टाकली.

आफ्रिकेतील विल्डर बिस्ट्स नावाच्या प्राण्यांच्या लाखोंच्या झुंडी बेफाम पळत निघालेल्या आहेत, हे दृश्य आपण कित्येक वेळा डिस्कवरी, नॅशनल जिओग्राफिक चॅनेलवर पहात असतो ना, तशी हजारो शस्त्रधारी बंडखोरांची एक अजस्र लाट शिबिराकडे झेपावत होती… त्यांची संख्या खरं तर याही पेक्षा अधिक असावी. पण छत्तीस जवानांच्या समोर हे म्हणजे अजस्र आव्हानच!

समरपाल सिंग साहेबांनी धाडकन खाली उडी घेतली. आपल्या सैनिकांना सावधनतेचा इशारा दिला. अगदी साधे बंकर्स… पत्र्यांचे…. आत फक्त वाळूने भरलेली काही पोती… गोळीबारापासून बचाव करण्यासाठी! त्यात मर्यादित शस्त्रसाठा. कुणी मदतीला येण्याची शक्यता नाहीच. जे मदत करू शकतील ते थोडेथोडके नव्हेत… पाचशे किलोमीटर्स अंतरावर होते… त्यांना येण्यास वेळ लागला असताच.

नाही म्हणायला आपल्या सैनिकांची आणखी एक छोटी तुकडी तिथून दीड किलोमीटर अंतरावर नदीच्या तीरावर तैनात होती. पण ते आणि शरणार्थी शिबिर यांच्यातल्या या दीड किलोमीटर्स अंतरामध्ये हे बंडखोर अचानकपणे उपटले होते. म्हणजे आपल्या त्या सैनिकांना आपल्या सैनिकांच्या मदतीला येण्याच्या मार्गात हे एवढ्या मोठ्या संख्येत असलेले बंडखोर होते. परिस्थिती बिकट होती!

बंडखोरांनी संधीचा फायदा उचलून शिबिरावर अंदाधुंद गोळीबार सुरु केला. आपल्या सुदैवाने त्या अप्रशिक्षित हल्लेखोरांना बंदुकीने नेमका नेम कसा साधायचा हे माहित नव्हते. प्रशिक्षण नसल्याने ते कसेही वेडेवाकडे फायरिंग करीत होते. अधूनमधून गोळीबार थांबायचा.

साहेब स्वत: एका बंकरमध्ये घुसले आणि त्यांनी रायफलचा ताबा घेतला… कारण तेथे तैनात असलेली एक परदेशी सैनिकांची तुकडी एवढा मोठा हल्ला बघून तिथून पळून चालली होती. साहेबांनी त्या पळपुट्यांकडे पाहून असे काही म्हटले की त्यापैकी दोन साधे शिपाई परतले आणि म्हणाले… “साब… अब हम आपके अंडर हैं… आप जो कहेंगे वो करेंगे!” त्यांचा अधिकारी मात्र तिथून पळून गेला तो गेलाच.

– क्रमशः भाग दुसरा 

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
image_print