मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “स्त्री म्हणजे…” ☆ संध्या बेडेकर ☆

संध्या बेडेकर

? इंद्रधनुष्य ?

☆ “स्त्री म्हणजे…” ☆ संध्या बेडेकर ☆

स्त्री म्हणजे शस्त्र आणि शास्त्र या दोन्हीचे Perfect combination आहे.

“26 th August” महिला समानता दिवस. ” अमेरिकेत ‘1893 ‘ साली सुरू झालेला हा दिवस तेथील महिलांना voting rights मिळावे, याकरिता सुरू झाला होता 1920 साली 26 th August. ला हा अधिकार त्यांना मिळाला. ••••

हा दिवस खूप महत्वाचा दिवस आहे. या आधी स्त्री ला, पुरुषांच्या बरोबरीने समान आदर, हक्क मिळावे. ही स्त्रियांची मागणी होती. या विचाराला चालना मिळाली. जनजागृती ची सुरुवात झाली होती. कोणत्याही चळवळीची सुरुवात होणे, हा नेहमीच एक महत्वाचा Turning Point असतो. ••••

आजची स्त्री याच चळवळीचा परिणाम आहे. •••

महिला आणि पुरुषांची तुलना करणे ही गोष्ट मला खूप आवडतं नाही. पटतही नाही. सृष्टी ने स्त्री व पुरुष दोघांची शारिरीक व मानसिक रचना खूप विचारपूर्वक केली आहे. ते एकमेकांचे पूरक आहेत. ••• दोघे एकमेकांशिवाय अपूर्ण आहेत. ••• दोघे एकमेकांचे आधार आहेत. •••दोघांचे जन्मजात गुण मिळुनच प्रकृतीची /सृष्टीची काळजी घेण्यात ते समर्थ आहेत. •• त्यांच्यात स्पर्धा नसावी. ती एक टीम आहे. अशा अर्थाने घ्यावे. ••••

स्त्री प्रकृतीची ची अलौकिक अदभुत सर्वोत्तम कलाकृती आहे. ती जगाची ओळख आहे. ती नसेल तर संपूर्ण जगात काळोख आहे. •••

स्त्री पुर्वीपासून अशीच आहे. आपण इतिहासातील तिच्या पराक्रमाच्या, सहनशीलतेच्या, त्यागाच्या, गाथा ऐकलेल्या आहेत. आज जेव्हा तिला अधिकार मिळाले. स्वतंत्रता मिळाली. तेव्हा सामान्य स्त्री सुध्दा चौखटीतुन बाहेर पडली. ती मोकळी झाली. व्यक्त होऊ लागली. काळा बरोबर धावणे तिला जमू लागले. तिची उपस्थिती समाजात जाणवू लागली. तिच्या गुणांचा प्रभाव समाजात दिसू लागला. व समाजात त्यामुळे झालेला बदलही दिसू लागला. •••

स्त्री म्हणजे ‘शस्त्र ‘आणि ‘शास्त्र ‘ दोन्ही च perfect combination आहे. शौर्य आणि संस्कृती जपणारी, दोन्हीत प्रविण. आपल्या परिवाराची काळजी घेणारी. जीव ओवाळून टाकणारी स्त्री. जेंव्हा प्रतिष्ठेचा प्रश्न येतो, मग ती प्रतिष्ठा नवऱ्याची असो, नाही तर देशाची असो, ती आपले शौर्य दाखविण्यात मागे पूढे बघत नाही. •••

आजच्या स्त्रीने प्रगतीची तलवार कंबरेला खोचली आहे. आज ती गल्ली पासून दिल्ली पर्यंत पोहोचली आहे. एक पाउल घरात तर एक अंतराळात ठेवले आहे. •• ••••मंत्री बनून देश चालवते •••. टीचर बनून अंधार घालवते. •••आज ती पूढे येणाऱ्या प्रत्येक आव्हानाला सज्ज आहे. •••

** अनवाणी ते कॅटवॉक ** 

प्रत्येक क्षेत्रात तिने आपली योग्यता वेळोवेळी दाखवून, ती समानतेची अधिकारी आहे. हे सिद्ध केले आहे. आता समानतेचा प्रश्न उरतच नाही. •••

स्त्री व पुरुष जेव्हा एकमेकांना आधार देतात. एकमेकांबरोबर खंबीर पणे उभे राहतात, तेंव्हा दोघांची शक्ती द्विगुणित होते. ••••

– – ही आजच्या स्त्रीची एक सशक्त बाजू झाली. पण दुर्दैवाने तिची दुसरी बाजूही आहे. ती तेवढी सशक्त नाही खरं तर नाजूक च आहे. ••••

आजही आपण

“बेटी बचाव बेटी पढाव “.

“स्त्री भ्रूण हत्या ” “acid attack'” “बलात्कार ” सारख्या बातम्या वर्तमानपत्रात वाचतो. शंभर दीडशे वर्षांपूर्वी चालू झालेली चळवळ आज ही चालू ठेवायला हवी आहे. अजून ही उद्देश्य पूर्ण झालेला नाही. •••

आजही ‘स्त्री स्वतंत्रता ‘व ‘स्त्री सुरक्षा ‘ हे दोन मुद्दे महत्त्वाचे आहेतच. •••••

ही विकृती, असे मनोरुग्ण आजही स्त्रीचा आदर मान ठेवण्यात असमर्थ आहेत.

” महिला समानता ” आता ही चळवळ घरोघरी चालू ठेवायला हवी आहे. पण आजही मुलगा झाला तर कणभर का होईना, जास्त आनंद होतोच. ही विचारधारा बदलायला हवी. स्त्रियांच्या संबंधित नियम, कानून, शिक्षा जास्त कडक व्हायला हवी.. •••

प्रत्त्येक वर्षी या दिवसांचे celebration म्हणजे आजच्या परिस्थितीची चाचणी करणे व त्यात सुधारणा करणे होय. ••••

ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. ••••

© संध्या बेडेकर 

पुणे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ‘स्त्री सक्षमीकरण: राष्ट्रोन्नतीचा उन्नत राजमार्ग…’ – भाग – २ ☆ डाॅ. मीना श्रीवास्तव ☆

डाॅ. मीना श्रीवास्तव

? इंद्रधनुष्य ?

☆ ‘स्त्री सक्षमीकरण: राष्ट्रोन्नतीचा उन्नत राजमार्ग…’ – भाग – २ ☆ डाॅ. मीना श्रीवास्तव ☆

(असे आर्थिक गणित सोडवण्यासाठी महत्त्वाची आर्थिक आणि सामाजिक संकल्पना समजून घेण्याची आवश्यकता आहे. या संकल्पनेचे निम्नलिखित मुख्य पैलू स्त्रीच्या आर्थिक आणि सामाजिक उत्कर्षासाठी अत्यंत महत्वाचे आहेत असे माझे मत आहे.) 

इथून पुढे – – 

मूल्य निर्मिती- संपत्ती फक्त एकाकडून दुसऱ्याकडे हस्तांतरित होत नाही. उद्योग, नाविन्य आणि गुंतवणुकीतून नवीन संपत्ती निर्माण होते, ज्यामुळे सर्वांचे जीवनमान सुधारू शकते. स्त्रियांचा स्वयंरोजगार म्हणजेच तिला स्वयंसिद्धा बनवण्याचा प्रयत्न वर निर्देशित तात्पुरत्या योजनांपेक्षा कित्येक पटीने महिलांचे कल्याण साधणारा आहे. म्हणजेच कुणाची भूक भागवण्यासाठी त्या व्यक्तीला एका वक्तासाठी मास्यांचे कालवण न देता त्या व्यक्तीला मासे पकडण्याकरता प्रवृत्त करा वे ही खरी व्यावहारिक दानशूर वृत्ती.

मानसिकता- श्रीमंत लोक संधी शोधतात, तर गरीब लोक केवळ कमावण्याचे साधन शोधतात. स्त्रीची सकारात्मक मानसिकता आणि आर्थिक साक्षरता तिला आपसूकच स्वःत्व शोधायला मदत करील.

शिक्षण आणि कौशल्य- महिलांना असे भाकड भत्ते देऊन परावलंबी आणि लाचार बनवण्यापेक्षा योग्य ते शिक्षण, कौशल्य प्रदान करणे आणि तिला स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी सर्वार्थाने मदत करून स्वावलंबी बनवणे ही कायमस्वरूपी भाऊबीज देणेच योग्य नाही कां?

संधींची समानता- श्रीमंत लोक त्यांच्या पैशाचा वापर करून अधिक गुंतवणूक करतात, ज्यामुळे संपत्ती वाढते. आर्थिक विषमता दूर करण्यासाठी सर्वांना सारखी संधी दिल्यास, संपत्ती निर्माण करणे शक्य आहे. इथे पैशांचे डोंगर उभारणे हा उद्देश नसून स्त्रीला आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र बनवणे हाच उद्देश आहे. एक उद्यमी स्त्री अनेक स्त्रियांना रोजगार देऊन त्यांना सक्षम बनवू शकते.

 थोडक्यात, संपत्ती वर्धमान करणे ही काळाची गरज आहे आणि संपूर्ण समाजाच्या खऱ्याखुऱ्या प्रगतीचे लक्षण आहे, कारण अमक्याच्या खिशातून निधी घेत (तो आपणच देतोय असे भासवत) तमक्याला कांही क्षणांकरता आभासी श्रीमंत बनवण्याची कला मते उकळण्यापलीकडे कांहीही साध्य न करता केवळ समस्या हस्तांतरित करण्याचे उथळ साधन आहे.

एकत्रितपणे, जमेल तसे आंगिक, कार्यिक आणि सामाजिक ‘दान’ देणे म्हणजे लिंग समानता निर्माण करण्यासाठी राबवल्या जाणाऱ्या उपक्रमांना मदत करणे हे प्रत्येक नागरिकाचे आणि नागरिक गटाचे कर्तव्य आहे. आपल्या देशाची लोकसंख्या बघता सरकारी आणि गैरसरकारी यंत्रणा निश्चितच अपुऱ्या आहेत. एकच उदाहरण द्यायचे तर गरीब मुलींची शैक्षणिक जबाबदारी घेणे, याला आपण खारीचा वाटा म्हणू या. पण दात्यांची संख्या असंख्य असेल तर हा स्त्री विकासाचा सेतू बांधणे शक्य आहे. मंडळी, भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांनी आपल्या अवाढव्य लोकसंख्येबाबत सकारात्मक आणि विकासाभिमुख दृष्टिकोन मांडला होता. ते म्हणत, “भारताची लोकसंख्या ही केवळ समस्या नसून ती एक शक्ती आणि संपत्ती देखील आहे. ” म्हणूनच आपल्या दात्यांचे संख्याबळ हीच आपली ताकद आहे. गरज आहे ती त्यांच्यापर्यंत पोहोचण्याची. आमच्या संकुलात ‘गूंज’ या संस्थेचे कार्यकर्ते वापरण्याजोगे जुने कपडे, भांडी, स्टेशनरी, पुस्तके इत्यादी सामान नेण्याकरिता ट्रक घेऊन येतात. दिवाळीच्या आधी या उपक्रमाला भरपूर प्रतिसाद मिळतो आणि ट्रक काठोकाठ भरतो. गरजू व्यक्तींना या सामानाचे यथायोग्य वाटप केल्या जाते. हा अगदी लहानसा वाटणारा उपक्रम मुंबईतील कित्येक संकुलात राबवल्या जातो तेव्हा हा ज्ञानयज्ञ अतिव्यापक होतो.

रूढीवादी कल्पनांना छेद देत मुलीला मुलाइतकाच सकस आहार देणे, घरकामाची विभागणी करतांना किंवा आर्थिक पाठिंबा देतांना मुलांमध्ये लिंगभेद न करणे, मुलीचे लग्न ती आर्थिकदृष्ट्या सक्षम झाल्यावरच योग्य वयात करून देणे, या सारख्या गोष्टी स्वतःच्या कुटुंबापासून सुरु होतात. मुलगी सासरी गेल्यावर तिला योग्य ती वागणूक मिळाली नाही, हुंड्यासाठी किंवा इतर कारणांसाठी तिचा छळ होत असल्यास तिच्या माहेरच्यांनी तिच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे, यामुळे कित्येक हुंडाबळी टाळल्या जाऊ शकतील. आपल्या शेजारी किंवा जवळपासच्या कुटुंबात असे होत असेल तर “मला काय त्याचे? ” असा उपरा सवाल न करता समाजातील एक घटक या नात्याने या अन्यायाला वाचा फोडणे आपले कर्तव्य आहे.

एका मुद्द्याकडे आपले लक्ष वेधू इच्छिते. स्त्रियांची कार्यक्षेत्रे मर्यादित ठेवण्यात पारंपारिक दृष्टिकोन महत्वाची भूमिका बजावत आलेला आहे. मोजकी क्षेत्रे म्हणजे कार्यालयांतील किंवा हॉटेलातील रिसेप्शनिस्ट, दवाखान्यातील परिचारिका, विमानातील हवाईसुंदरी इत्यादी! मात्र आता ‘हे स्त्रियांचे, ते पुरुषांचे’ असा लिंगभेद नष्ट करण्याची वेळ आलेली आहे. अन्यथा कांही क्षेत्रांत स्त्रियांची अफाट गर्दी तर कांही क्षेत्रात पुरुषमंडळींची वानवा अशी परिस्थिती उद्भवू शकते. स्त्रीची कार्यक्षमता लक्षात घेता असा कुठलाच प्रांत नाही ज्यात ती आपला ठसा उमटवू शकत नाही, हे मर्यादित संख्येत कां होईना स्त्रियांनी दाखवून दिलेले आहे. यासाठी मुलींना मळलेल्या वाटा सोडून इतर क्षेत्रात शिक्षण घ्यावे लागेल. इथे ‘स्टेम’ (STEM- Science, Technology, Engineering, Maths) ही संकल्पना स्त्रियांना अफाट कार्यक्षेत्रे उपलब्ध करून देऊ शकते. ‘स्टेम’ मुख्यत्वेकरून अमेरिकेत २००० सालापासून अस्तित्वात आली, आपल्या देशात २०२० च्या “राष्ट्रीय शैक्षणिक धोरण” या अंतर्गत या संकल्पनेचा अंतर्भाव करण्यात आलेला आहे. या विषयी थोडक्यात सांगते.

या संकल्पनेचे निम्नलिखित घटक आहेत. कंसात संबंधित व्यवसायाची मोजकीच उदाहरणे दिलेली आहेत.

  • विज्ञान आणि आरोग्यसेवा: नैसर्गिक जग समजून घेणे – (डेटा सायंटिस्ट, अनुवांशिक संशोधक आणि वैद्यकीय व्यावसायिक.
  • तंत्रज्ञान: डिजिटल साधने आणि प्रणालींचा वापर- (सॉफ्टवेअर डेव्हलपर, एआय/मशीन लर्निंग इंजिनिअर, सायबरसुरक्षा विश्लेषक)
  • अभियांत्रिकी: डिझाइनिंग, बांधकाम आणि संबंधित समस्या सोडवणे- (एरोस्पेस, बायोमेडिकल, सिव्हिल आणि रोबोटिक्स अभियंता)
  • गणित आणि वित्त: डेटाचे विश्लेषण, संगणन आणि मॉडेलिंग- (अ‍ॅक्च्युअरी {विमा उतरवणा-या कंपनीकडे असलेला संख्याशास्त्रज्ञ}, सांख्यिकीशास्त्रज्ञ आणि आर्थिक विश्लेषक) 

कांही तज्ज्ञ मंडळी यांच्यासोबत कलाक्षेत्र देखील जोडून या संकल्पनेस STEAM (‘स्टीम’) असे संबोधतात. त्यात A म्हणजे आर्ट अर्थात अतिभव्य असे कलाक्षेत्र देखील समाविष्ट केले जाते. कलेचे प्रांगण अतिशय विस्तृत असून त्यात प्रामुख्याने सर्जनशीलतेस भरपूर वाव आहे. एआयच्या जगात या अभिनव सृजनाचे महत्व आपण सर्व जाणतो. किंबहुना अत्युच्य पातळीवरील सर्जन हेच मानवाचे मूल्याधारित अस्त्र आहे असे दिसते. म्हणून मला स्टेम ऐवजी स्टीम ही संकल्पना अधिक भावली. या अभिनव शैक्षणिक धोरणाचे महत्व जर समजून घ्यायचे असेल तर वर निर्देशित प्रमुख शाखांचे एकात्मिक शिक्षण देणे गरजेचे आहे. मंडळी, या योजनेतील आदर्शांनुसार अगदी केजीपासून तर पदव्युत्तर शिक्षणापर्यंत या संकल्पनेची व्याप्ती असायला हवी आणि त्यात प्रत्येक बालक आणि बालिकेला शिक्षणाचा समसमान अधिकार असावा. हा दृष्टिकोन केवळ पुस्तकी ज्ञानाऐवजी प्रात्यक्षिके, समस्या निवारण आणि गंभीर विचार क्षमतेवर भर देतो. व्यावहारिक ज्ञान मिळवून देणारे हे शिक्षण विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना २१ व्या शतकातील व्यवसायाच्या असंख्य संधी उपलब्ध करून देईल अशी आशा आहे. यामुळे प्रत्येक व्यवसायात लिंगभेदाच्या पलीकडे जाऊन केवळ गुणवत्तेच्या आधारावर मूल्यमापन होऊन स्त्रियांना आपसूकच प्रवेश घेता येईल.

नवीन कल्पनांवर काम आणि प्रयोग करण्याची संधी देणाऱ्या या पद्धतीचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांना भविष्यातील तांत्रिक आव्हानांसाठी सक्षम बनवणे हा आहे. जेव्हा आपण कांही देतो, तेव्हा त्याचा आपल्याला नक्कीच फायदा होतो. स्त्री सक्षमीकरणाने निव्वळ तिचाच नव्हे तर सर्वांगाने राष्ट्राचा फायदा होणार आहे. “गिव्ह टू गेन” चा खरा आश्वासक संदेश हाच आहे. शिक्षित स्त्री ही एक सशक्त कुटुंबाचा, समाजाचा आणि राष्ट्राचा आधारस्तंभ आहे. यात चूल आणि मूलच्या पल्याड जाऊन ती जेथे पाऊल ठेवेल ते तिचे कार्यक्षेत्र असायला हवे. नवनवीन आव्हाने पेलण्यासाठी तिची ऊर्जा कार्यान्वित व्हायला हवी. आधुनिक काळात विविध क्षेत्रातील महिलांचे नेतृत्व वाढवणे आणि त्यांच्यातील कौशल्यांचा विकास करणे हे लैंगिक समानता आणि शाश्वत प्रगतीसाठी अत्यंत आवश्यक आहे.

आपल्या जगाचे रूपांतर करण्यासाठी आपल्याला जादूची गरज नाही. आपल्याला आवश्यक असलेली सर्व शक्ती आपण आधीच स्वतःमध्ये बाळगतो. “ 

 जे के रोलिंग

– समाप्त –

©  डॉ. मीना श्रीवास्तव

ठाणे

मोबाईल क्रमांक ९९२०१६७२११, ई-मेल – drmeenashrivastava21@gmail.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ पुरणपोळ्या आणि युरोपियन होळ्या… लेखिका : अवनी दाते – पोलंडकर ☆ प्रस्तुती – सुश्री मीनल केळकर☆

सुश्री मीनल केळकर

? इंद्रधनुष्य ? 

☆ पुरणपोळ्या आणि युरोपियन होळ्या… लेखिका : अवनी दाते – पोलंडकर ☆ प्रस्तुती – सुश्री मीनल केळकर ☆

मंडळी, हुताशनी पौर्णिमा. म्हणजेच होळी. परदेशात राहत असल्यापासून माझ्यासाठी या दिवसाचं महत्व फक्त पुरणपोळी खाण्याचा दिवस इतकंच आहे. कारण इथे काही मला होलिका दहन साजरे करता येत नाही आणि फारसे भारतीय नसल्याने रंगपंचमी सुद्धा साजरी होत नाही.

तर आज मी निगुतीने पुरण शिजवून साग्रसंगीत पुरणपोळ्यांचा स्वयंपाक केला होता. संध्याकाळी एका पोलिश मैत्रिणीला भेटायला जायचे होते. जाताना तिच्यासाठी म्हणून तीन – चार पुरणपोळ्या डब्यात घालून नेल्या. तिने पहिला घास खाताच मस्त म्हणून दाद दिली. मग कशापासून बनवल्या, कशा बनवल्या, आणि मग शेवटचा प्रश्न का बनवल्या? आज काय विशेष असे प्रश्न एकामागून एक सुरू झाले. तिला होळी(हिंदीमधली रंगांची “होली”) याबद्दल जुजबी माहिती होती. पण मग आपली होळी, होलिका दहन, रंगपंचमी या गोष्टी तिला सांगत असतानाच ती मला म्हणाली, तू माझी मस्करी तर करीत नाहीस. मी म्हणाले, नाही गं, असं का वाटलं पण तुला? तर तिने जे काही सांगितलं ते माझ्यासाठी पण अचंबित करणारं होतं. तुम्हाला ऐकायचंय? मग ऐका तर.

आपण आपल्या भारत देशात होळी, होलिका दहन किंवा रंगपंचमी म्हणून ज्या काही प्रथा साजऱ्या करतो त्या करणारा आपण भारत एकमेव देश नसून अनेक युरोपियन देशांमध्ये थोड्या फार फरकाने तशाच प्रथा साजऱ्या केल्या जातात. आपण जसे थंडी संपून उन्हाळ्याची चाहूल लागली की होळी पेटवतो तसेच हे देश त्यांच्या त्यांच्या हवामानानुसार थंडी संपून वसंताची चाहूल लागताच त्यांच्या त्यांच्या होळ्या पेटवून या प्रथा साजऱ्या करतात.

पोलंड मध्ये वसंत ऋतूचा पहिला दिवस आणि हिवाळ्याचा शेवटचा दिवस म्हणजेच २१ मार्च रोजी त्यांच्या पद्धतीची होळी साजरी केली जाते. ज्याला “तोपीयेन्ने माझान्ने” म्हणजेच “माझान्ना ला बुडवणे” असे म्हणतात. माझान्ना ही मृत्यू आणि हिवाळ्याची स्लाव्हिक देवी असून, तिचे प्रतिनिधित्व करणारा, वाळलेल्या गवताच्या पेंढ्यापासून एक पुतळा बनवला जातो. त्याला स्त्रीचा वेश परिधान केला जातो, त्याची गावातून अंत्ययात्रा काढली जाते. नंतर सर्वजण मिळून त्यास पेटवून देतात आणि तो नदी, तलाव किंवा अन्य पाणवठ्यावर फेकून देतात. पोलिश लोकांच्या श्रद्धेनुसार हा विधी मृत्यूवरील विजय, हिवाळ्यातील काळोख्या दिवसांचा शेवट आणि निसर्गाच्या पुनर्जन्माचे प्रतीक आहे.

त्या नंतर काहीच दिवसात पोलंडमधील प्रमुख सण इस्टर येतो. ईस्टरच्या पवित्र सोमवारी पोलंडमध्ये “श्मीगुस डिंग्युस” नावाची प्रथा साजरी केली जाते जी आपल्या रंगपंचमीची आठवण करून देते. मात्र यात रंग न वापरता फक्त पाणी उडवून एकमेकांना भिजवले जाते. ईस्टरच्या काही दिवस आधी बाजारामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या पिचकाऱ्या विक्रीसाठी येतात. पाणी हे जीवनाचे प्रतीक मानले जात असल्याने, अश्या पद्धतीने पोलिश लोक हास्य आणि आनंदाच्या शिडकाव्याने (आणि भरपूर पाण्याने) वसंत ऋतूचे स्वागत करतात.

हे सगळं मैत्रिणीकडून ऐकल्यानंतर मी इतरही युरोपियन देशांमध्ये अशा काही परंपरा आहेत का याचा अभ्यास केला आणि मी थक्क झाले. त्यापैकी काही देशातील पद्धतींबद्दल मी तुम्हाला सांगते.

चेक रिपब्लिक: 

चेक रिपब्लिकमध्ये ३० एप्रिल रोजी ही होळीसदृश प्रथा मोठ्या जल्लोषात साजरी केली जाते. या प्रथेचा मुख्य उद्देश हा वसंताचे स्वागत आणि हिवाळ्यातील चेटकीणी आणि अंधारातील दुष्ट आत्म्यांना पळवून लावणे हा आहे. चेक लोकांचं असं मानणं आहे की हिवाळा ऋतू हा चेटकिणींना (आणि इतर दुष्ट आत्म्यांना) शक्ती देतो आणि वसंत ऋतू सुरू होताच या चेटकीणी अस्वस्थ होतात आणि मग इतर दुष्ट आत्म्यांसोबत त्या मोठ्या पार्ट्या करतात ज्या थांबवाव्या लागतात.

आता तुम्हाला प्रश्न पडेल की चेटकिणींची पार्टी थांबवायची कशी?

तर चेक लोक मोठ्या उद्यानात अथवा मोकळ्या मैदानात भल्यामोठ्या शेकोट्या पेटवतात आणि काड्या व पेंढ्यापासून बनवलेल्या एका चेटकीणीचा पुतळा त्या शेकोटीच्या टोकावर ठेवला जातो आणि हिवाळ्याच्या समाप्तीचे प्रतीक म्हणून जाळला जातो.

आणि चेटकिणींना उष्णता आणि आगीचा तिटकारा असल्यामुळे त्या पुढील हिवाळ्यापर्यंत काढता पाय घेतात.

तसेच चेक लोक देखील पोलंडप्रमाणेच इस्टरच्या सोमवारी पाण्याची प्रथा साजरी करतात. मात्र येथे फक्त पुरुष त्यांच्या बायको अथवा प्रेयसीवर खेळकरपणे पाणी उडवतात. आणि त्यांना पाम झाडाच्या फांदीने हळुवार प्रतिकात्मक फटके मारतात. जे प्रजनन क्षमता, आरोग्य आणि तारुण्याचे प्रतीक आहे. ही परंपरा येत्या वर्षासाठी महिलांना सुंदर आणि निरोगी ठेवते असे मानले जाते.

जर्मनी: 

जर्मनीतील होळी ज्याला “वालपुरगिसनाख्त” असे म्हणतात, दरवर्षी ३० एप्रिलच्या रात्री सुरू होऊन १ मे रोजी संपणारा उत्सव आहे.

वालपुरगिस नाईट ही आठव्या शतकातील संत वालपुरगा हिच्यामुळे ओळखली जाते. ही संत वालपुरगाबाई ख्रिश्चन धर्माचा प्रसार, तसेच जादूटोण्याला दूर ठेवण्यात आणि विविध आजार बरे करण्याच्या तिच्या कथित गुणांसाठी ओळखली जाते. तिच्या निधनानंतर, जादूटोण्याला लांब ठेवण्यासाठी लोक तिची प्रार्थना करीत असत.

पूर्वीच्या काळी लोकांचा असा विश्वास होता की चेटकिणी आणि सैतान दरवर्षी ब्रोकेन पर्वतररांगातील हार्ज पर्वतांमध्ये वसंत ऋतूच्या स्वागतार्थ एकत्र येतात. तेथे ते नृत्य करतात आणि ख्रिश्चनांना हानी पोहोचवण्यासाठी कट रचतात.

म्हणून मग लोक डोंगराच्या कडेला मोठाली शेकोटी पेटवत आणि त्यात वाळलेल्या गवतापासून बनवलेल्या चेटकिणी सारख्या दिसणाऱ्या बाहुल्या फेकून देत. आणि चेटकिणींना घाबरवण्यासाठी मोठमोठाली भांडी वाजवून, कर्कश्श आवाजात गाणी म्हणून किंवा बोंब ठोकून शक्य तितका मोठा आवाज काढीत असत.

आजही ही वालपुर्गीस नाईट जर्मनीमध्ये हिवाळ्यातील दुष्ट अंधाऱ्या शक्तींना दूर ठेवण्यासाठी, मुख्यत्वे डोंगराळ प्रदेशात साजरी केली जाते.

स्लोवाकिया, हंगेरी: 

या देशातही जर्मनीप्रमाणेच ३० एप्रिल रोजी ही वालपुर्गीस नाईट साजरी केली जाते.

तसेच ईस्टरच्या पवित्र सोमवारी चेक रिपब्लिक सारखीच पाणीपंचमी खेळली जाते ज्यास “ओब्लिएवाचका” असे म्हटले जाते. मात्र यात शक्यतो बिनलग्नाच्या तरुण मुलींना तरुणांकडून थंडगार पाण्याने चिंब भिजवले जाते. असे करणे त्या मुलींसाठी चांगले आरोग्य, प्रजननशक्ती, आणि सौंदर्य घेऊन येते असे स्लोवाकियन लोक मानतात. आपल्याकडे देखील होळी अथवा रंगपंचमीला वृंदावनात गोप गोपिकांवर रंग उधळीत असत, नाही का?

स्कॅन्डिनेव्हिया:

कालांतराने जर्मनीमधून ही वालपुर्गीस नाईट ची प्रथा स्कॅन्डेनेव्हियन देशांमध्येही आली आणि आज या देशांतही मोठ्या प्रमाणावर ३० एप्रिल रोजी हा दिवस साजरा केला जातो. स्वीडिश लोक एकत्र येऊन हिवाळ्यात वाळून पडलेल्या झाडाच्या फांद्या आणि वाळके गवत एकमेकांवर रचून खूप मोठ्या शेकोट्या पेटवतात, रात्रभर गाणी म्हणतात, शेकोटीत सॉसेजेस भाजून खातात आणि हिवाळ्यातील दुष्ट शक्तींना हाकलून लाऊन, वसंताचे जोरदार स्वागत करतात.

त्याचबरोबर २३ जून रोजी संध्याकाळी “संकथानसाफ्टेन” नावाचा एक होळीसारखाच सण नॉर्वे, डेन्मार्क, स्वीडन आणि फिनलंड मध्ये साजरा केला जातो. या दिवशी या देशांमध्ये वैशिष्ट्यपूर्ण, मोठ्या मोठ्या शेकोट्या पेटवल्या जातात. येथे अशी शेकोटी पेटवण्याची प्रथा पूर्व-ख्रिश्चन काळापासून आहे, जेव्हा लोक उन्हाळ्यातील दीर्घकाळ राहणाऱ्या सूर्याचा सन्मान करण्यासाठी ही प्रथा साजरी करीत असत. सूर्य म्हणजे जीवन, प्रजनन क्षमता आणि निसर्गाच्या शक्तीचे प्रतीक. तेव्हा अग्नीला प्रतीकात्मक आणि जादुई महत्त्व होते. अग्नी हा वाईट आत्म्यांना दूर करण्यासाठी, पिकांची भरभराट आणि ऊर्जा निर्माण करण्यासाठी महत्त्वाचा मानला जात असे. स्कॅन्डेनेव्हियन लोकांचे असे म्हणणे होते की या विशिष्ट रात्री, चेटकिणी सक्रिय होतात आणि सैतानाला भेटण्यासाठी आणि वाईट कृत्य करण्यासाठी एकत्र येतात. शेकोटी पेटवणे हे या वाईट शक्तींना दूर ठेवण्याचा उपाय होता.

ग्रीस: 

ग्रीसमध्ये देखील वसंतादरम्यान ग्रीक पद्धतीने होळी साजरी केली जाते. त्याला “बर्निंग ज्यूडा” असे नाव आहे. ज्युडा म्हणजेच यहूदी.

तर ही यहूदाला जाळण्याची प्रथा प्राचीन काळापासून ग्रीसमध्ये मोठ्या उत्साहाने साजरी केली जात आहे. ग्रीक लोकांच्या मानण्यानुसार यहूदा हा येशू ख्रिस्ताच्या बारा प्रेषितांपैकी एक होता, ज्याने त्याचा विश्वासघात केला आणि त्याला क्रूसावर चढवले. ग्रीक इतिहासात, यहूदा विश्वासघात दर्शवितो आणि त्याचा पुतळा जाळण्याची प्रथा त्याच्या कृत्यांसाठी त्याला प्रतीकात्मक शिक्षा देण्याचा एक मार्ग आहे. आपण रावणदहन करतो साधारण काहीसं तसंच.

ईस्टरच्या पवित्र शनिवारी संध्याकाळी, गावातील रस्त्यांवरून एक मिरवणूक निघते, ज्यामध्ये यहूदाचा पुतळा घोड्यावरून नेण्यात येतो. नंतर हा पुतळा खांबावर टांगला जातो आणि त्याला आग लावली जाते. या मिरवणुकीदरम्यान लोक कर्कश्श आवाज काढतात. कधीकधी न आवडणाऱ्या राजकीय नेत्यांच्या नावाने बोंब सुद्धा ठोकतात. पुतळा जाळताच, फटाक्यांची आतषबाजी होते आणि लोक टाळ्यांच्या गजरात जल्लोष करतात. ही प्रथा वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक आहे आणि नकारात्मक ऊर्जा काढून टाकून सकारात्मक गोष्टींचे स्वागत करण्याचा एक मार्ग आहे.

इटली:

इटालियन लोक मात्र त्यांची होळी एकदम स्टायलिश पद्धतीने साजरी करतात. विशेषतः इटलीमधील फ्लॉरेन्समध्ये हा उत्सव अगदी नेत्रदीपक पद्धतीने साजरा करण्यात येतो. दरवर्षी इस्टरच्या पवित्र रविवारी अख्खे फ्लॉरेन्स शहर “स्कॉपियो डेल कॅरो”(“कार्टचा स्फोट”) नावाचा होळी सारखाच सण साजरा करण्यासाठी एकत्र जमते. या चमकदार देखाव्यामध्ये फटाक्यांनी भरलेली 30 फूट उंच अशी प्राचीन बैलगाडी असते.

ईस्टर प्रार्थने दरम्यान, कॅथेड्रलच्या आतून एक यांत्रिक कबुतर (ज्याला ‘कोलंबिना’ म्हणतात) बाहेरील बैलगाडीकडे तारेद्वारे सोडले जाते. हे कबुतर रॉकेट्सने भरलेले असते, आणि इटालियन लोक असे मानतात की ते पवित्र अग्नी घेऊन जाते. जेव्हा हे कबुतर गाडीवर आदळते तेव्हा गाडीत भरलेले फटाके जोरात फुटतात, ज्यामुळे एक नेत्रदीपक आतषबाजीचे प्रदर्शन होते.

इटालियन लोकांची अशीही श्रद्धा आहे की जर कबुतर यशस्वीरित्या गाडीवर आदळले आणि व्यवस्थित स्फोट होऊन आतिषबाजी झाली तर तो अतिशय शुभसंकेत मानला जातो, जो चांगले पीक, शांती आणि भरभराट घेऊन येतो.

स्वित्झर्लंड: 

येथील होळीसमान प्रथा थोडी मजेदार असते. त्याला “झेक्सएहलाऊतेन” असे नाव आहे. तो एप्रिल महिन्यातील तिसऱ्या सोमवारी साजरा केला जातो. यामध्ये कापूस आणि लोकरीपासून एक मोठा बूग नावाचा स्नोमॅन बनवला जातो. आणि मोठ्या शेकोटीच्या टोकावर उभा करून तो बरोब्बर संध्याकाळी ६ च्या ठोक्याला जाळून टाकला जातो. हा स्नोमॅन हिवाळा आणि थंडीचे प्रतीक मानला जातो. आग लागल्यानंतर जितका लवकर हा स्नोमॅन पेट घेईल तितका उन्हाळा ऊबदार आणि सुखकर होईल असे मानतात. आणि हळू पेट घेणारा स्नोमॅन पावसाळी आणि गारठा असणारच उन्हाळा सूचित करतो.

आता बरोबर ६ च का? तर एरवी तिथे कामगार दररोज ५ वाजेपर्यंत काम करतात, पण एकदा डे लाईट सेव्हिंग सुरू झालं की ते रोज ६ वाजेपर्यंत काम करू लागतात.

तर मंडळी, आहे की नाही नवल? मला तर हे सगळं वाचून कुठेतरी प्रत्येक धर्मातील पाळेमुळे एकमेकांशी जोडलेली आहेत याचा पक्का विश्वास वाटतो. आपली होलिका राक्षसी असो, पोलंडची मार्झन्ना असो, हिवाळी चेटकीणी असोत, ज्युडा असो किंवा मग हिवाळ्याचे प्रतीक बूग स्नोमॅन असो, सगळ्यांचा उद्देश एकच, अंधाऱ्या कडाक्याच्या दिवसांवर मात करून, नवीन प्रकाशमय ऋतूची चाहूल माणसाला पुन्हा एकदा आयुष्य पूर्ण उत्साहाने जगण्यासाठी सज्ज करते, सकारात्मक ऊर्जा देते आणि पुन्हा एकदा निसर्ग नितांतसुंदर असण्याची प्रचिती आणते. हो की नाही?

तुम्हाला अजून कुठल्या वेगळ्या देशातील निराळी होळी माहित असल्यास मला कमेंट्स मध्ये नक्की सांगा बरं का.

लेखिका : अवनी दाते – पोलंडकर

प्रस्तुती – मीनल केळकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ‘स्त्री सक्षमीकरण: राष्ट्रोन्नतीचा उन्नत राजमार्ग…’ – भाग – १ ☆ डाॅ. मीना श्रीवास्तव ☆

डाॅ. मीना श्रीवास्तव

? इंद्रधनुष्य ?

☆ ‘स्त्री सक्षमीकरण: राष्ट्रोन्नतीचा उन्नत राजमार्ग…’ – भाग – १ ☆ डाॅ. मीना श्रीवास्तव ☆

नमस्कार प्रिय मैत्रांनो!

“मी एकटी जग बदलू शकत नाही, पण मी पाण्यात दगड टाकून अनेक लाटा निर्माण करू शकते.” 

 – मदर तेरेसा

स्त्री सक्षमीकरण आणि तिच्या शैक्षणिक अर्हतेशी समांतर असलेले आर्थिक स्वातंत्र्य यांचा अत्यंत जवळचा संबंध आहे. किंबहुना तिच्या सक्षमीकरणासाठी योग्य शिक्षणाधारित आर्थिक उत्त्पन्न हे सर्वाधिक महत्वाचे आहे. स्त्रीशिक्षणाचे महत्व अनन्यसाधारण आहे. मुलगी शिकली तर ती दोन घरांमध्ये ज्ञानाचा प्रकाश उजळू शकते ही संकल्पना जुनी असली तरी आज देखील कधी नव्हे इतकी प्रासंगिक आणि समर्पक वाटते. यंदाच्या ८ मार्च या ‘जागतिक महिला दिन’ या विशेष दिनानिमित्य २०२६ ची थीम अतिशय बोलकी आणि आकर्षक आहे. या थीमचा प्रमुख संदेश आहे: “गिव्ह टू गेन” अर्थात ‘कांही हवे असल्यास आधी द्या! ‘ यातील देवाणघेवाणीचा व्यवहार स्त्रिया युगानुयुगे करीत आल्या आहेत. ‘कोहळा देऊन आवळा घेणे’ असे या व्यवहाराचे उफराटे तत्वज्ञान आहे. जीवनभर दुसऱ्यांसाठी चंदनासारखे झिजत राहा, सुगंध येईल तेवढ्यावर आनंद मानीत राहा, कधी त्यागमूर्ती, तर कधी मखरातली देवी बनून राहा पण कांही मागू नकोस, अशी उपजतच शिकवणी घरातील थोरामोठ्या बायांकडून मिळाल्यावर परत तीच दामदुपटीने आपल्या मुलीकडे फॉरवर्ड करणे हे कांही एकल भारतीय स्त्रीचे वर्णन नाही. कमी-अधिक प्रमाणात हेच चित्र जगभरात जगात आढळून येते. नाही तर वेगळ्या महिला दिनाची गरज पडती ना!

२०२६ च्या महिला दिनी सकारात्मक दृष्टिकोनातून बघितल्यास हा जो देणे – घेणे नामक उपक्रम आहे त्यात ‘महिला सक्षमीकरण’ महत्वाचे पुढचे पाऊल आहे. हे प्रारूप मांडणारे विचारवंत म्हणतात, “ही वजाबाकी नसून प्रगतीचा हेतुपुरस्सर जोडलेला गुणाकार आहे. ” याला अनुषंगून मला एक सर्वविदित उदाहरण आठवते आहे. मॅट्रिकच्या परीक्षांचा हंगाम सुरु आहे. त्यांच्यापैकी कुठल्याही निकालाची टक्केवारी बघा, मुलींनीच आघाडी मारलेली असते. मंडळी, जेव्हां एखादी मुलगी कसून मेहनत करीत ज्ञानार्जन करीत असते तेव्हां ती तिच्या आयुष्यातील प्रगतीच्या मार्गातील अडथळे दूर करीत यशाच्या शिखराकडे वाटचाल करीत असते. मात्र आश्चर्याची गोष्ट की इयत्ता १२ वी नंतर पुढील शिक्षणाकरता आपल्या देशात ४९. ६% मुलांच्या तुलनेत ४७. २% मुली टिकून राहतात. महाराष्ट्रातील अलीकडली आकडेवारी आशादायक आहे. २०२३-२४ च्या आकडेवारीवरून असे दिसून आले आहे की माध्यमिक स्तरावर (माध्यमिक शाळा) १२. ३% मुलांनी शाळा सोडली, तर मुलींच्या बाबतीत हे प्रमाण ९. ४% होते. मुलींच्या उच्चशिक्षणाच्या आड कौटुंबिक आणि सामाजिक प्रतिबंध, लेकीचे हात पिवळे करण्याची तत्परता, घराजवळ महाविद्यालयांचा अभाव, आर्थिक विपन्नता, शैक्षणिक संस्थांच्या आवारात मुलींच्या मूलभूत गरज भागविण्याविषयी उदासीनता यासारखी कारणे दिलेली आहेत. मुलींची सुरक्षितता हा मुद्दा पालकांसाठी नेहमीच ऐरणीवर राहिला आहे. स्त्रीचे प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष लैंगिक शोषण ही सार्वकालीन समस्या आहे. दुर्दैवाने तिला भौगोलिक, आर्थिक व शैक्षणिक पातळ्यांचा अडसर नाही. सध्या जगभरात गाजत असलेल्या एपस्टीन फायलींच्या प्रकरणाने हा विषय वैश्विक आहे हे सिद्ध केले आहे. मात्र समाधानाची गोष्ट ही की मुलींसाठी शिक्षणातून माघार घेण्यात शिक्षणाविषयी उदासीनता हे कारण अभावानेच आढळते. जर समाज, संस्था आणि सरकार या अडचणींवर मात करण्यासाठी उदारकर्त्या दात्यांची भूमिका घ्यायला तयार झाले तर त्या संधीचे सोने करायला बहुतांश मुली तयार होतील असे वाटते. हाच तो समजून उमजून केलेला भविष्याप्रतीचा गुणाकार समजावा. दात्यांनी एक पट दिले तर गरजू मुली दहा किंवा अधिक पटीने समाजाचे ऋण फेडण्यास कंबर कसून मेहनत घेतील हे नक्की

 प्रिय मैत्रांनो, मला एक भविष्यकालीन आकडेवारी अचंभित करून गेली. २०२५ पर्यंत जागतिक लोकसंख्या पुरुषांना थोडेच झुकते माप देत आली आहे, दर १०० महिलांमागे अंदाजे १०१ ते १०२ पुरुष (अंदाजे ५०. ३% पुरुष: ४९. ७% महिला) असे! मुले जन्माला येत असताना (१०० मुलींमागे अंदाजे १०६ मुले) असा मामला असूनही पुरुषांमध्ये मृत्युदर अधिक आहे. त्यामुळे वृद्ध वयोगटात महिलांची संख्या समान किंवा अधिक आहे. त्यामुळेच जागतिक स्तरावर २०५० पर्यंत स्त्री-पुरुष प्रमाण समसमान होईल असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. हे जर सत्य म्हणून गृहीत धरले तर महिलांची भरभराट पुरुषांइतक्याच गतीने व्हायला हवी. प्रत्यक्षात वस्तुस्थितीचा अंदाज लावायला उच्चभ्रू समाजातील स्त्रिया, जन्मापासूनच एकल संतती म्हणून सर्वप्रकारच्या सुख-सोयी-सुविधा लाभलेल्या स्त्रिया किंवा मोजक्या सुधारक मनोवृत्तीच्या दानशूर पालकांच्या भाग्यवान कन्यका यांच्याकडे अंमळ दुर्लक्ष करावे लागेल. म्हणजे बघा, एखाद्या राज्यात मोठा राजवाडा आहे. सभोवती नोकर-चाकर मंडळींचा वावर असल्याने राजवाड्याच्या आसपास थोडीफार घरे आहेत. या राजवाड्याच्या परिसरात संपन्नता ओसंडून वाहत आहे. एखाद्या हुशार प्रवाश्याला राज्याच्या वैभवाचा अंदाज घ्यायचा असेल तर तो या राजवाड्याच्या परिसरात जाईल कां? नाही! तो एखाद्या गरीब नागरिकाच्या झोपडीत आसरा मागायला जाईल. अर्थात राजाच्या राज्याचा अंदाज लावायला त्याच्या राज्यातील निर्धनातील निर्धनांच्या झोपड्यांची परिस्थिती बघायला हवी.

श्रीमंती किंवा संपत्ती ही मर्यादित नसते, ती नवनिर्मित केली जाऊ शकते. एकाची गरिबी दूर करण्यासाठी दुसऱ्याला गरीब बनवण्याची गरज नाही, तर संधी, शिक्षण आणि कौशल्याच्या माध्यमातून गरिबांना सक्षम करणे आवश्यक आहे. हे प्रमेय मांडण्याचे कारण लाडकी बहीण योजना व तत्सम विद्यमान रेवडी वाटणाऱ्या तथाकथित समाजकल्याण योजना! या योजनांतून कुणाचे किती आणि कसे कल्याण होते, हे सांगायची मुळीच आवश्यकता नाही. या योजनांतून आपण आर्थिक सुस्थितीकडे जात नसून यांचा उपयोग एखाद्या बाळबोध पांगुळगाड्यासारखा करीत आहोत. मुळात फुकट पैसे मिळाले की त्यांची किंमत शून्य होते. असे आर्थिक गणित सोडवण्यासाठी महत्त्वाची आर्थिक आणि सामाजिक संकल्पना समजून घेण्याची आवश्यकता आहे.

 या संकल्पनेचे निम्नलिखित मुख्य पैलू स्त्रीच्या आर्थिक आणि सामाजिक उत्कर्षासाठी अत्यंत महत्वाचे आहेत असे माझे मत आहे.

– क्रमशः भाग पहिला 

©  डॉ. मीना श्रीवास्तव

ठाणे

मोबाईल क्रमांक ९९२०१६७२११, ई-मेल – drmeenashrivastava21@gmail.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ सज्जनांचे मौन : एक दाहक वास्तव… ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्री विश्वास देशपांडे

? इंद्रधनुष्य ?

☆ सज्जनांचे मौन : एक दाहक वास्तव… ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

 (जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर..) 

परवा टीव्हीवर महाभारतातला द्रौपदी वस्त्रहरणाचा प्रसंग पाहत होतो. हा प्रसंग अनेक वेळा पाहिलेला असला तरी प्रत्येक वेळी तो मनाला नव्याने अस्वस्थ करून जातो. खरे तर हा प्रसंग इतका हृदयविदीर्ण करणारा आहे की तो पाहवत नाही. भर दरबारात उभ्या असलेल्या द्रौपदीचा आक्रोश, तिने लज्जा रक्षणासाठी केलेली धडपड, तिचाआकांत, तिच्या डोळ्यांत दाटलेले अश्रू आणि तिची असहाय्यता पहावत नाही.

पण त्या प्रसंगात सर्वांत जास्त अस्वस्थ करणारी गोष्ट कोणती आहे हे माहिती आहे का? तर ती आहे सभेत बसलेली महान पराक्रमी अशी धुरंधर मंडळी. पितामह भीष्म, आचार्य द्रोण, कृपाचार्य, विदुर यांसारखे धर्मनिष्ठ आणि विद्वान मानले जाणारे लोक त्या दरबारात उपस्थित असतात. पण त्या वेळी ही सगळी मंडळी आपल्या तोंडात जणू मिठाची गुळणी धरून असतात. अन्याय डोळ्यांसमोर घडत असताना ते हातावर हात धरून शांत बसलेले दिसतात. त्यांची हतबलता पहावत नाही.

त्याशिवाय ज्यांनी अशा प्रसंगी उसळून उभे राहावे असे द्रौपदीचे पराक्रमी म्हणून ओळखले जाणारे पाच पतीदेखील त्या वेळी असहाय्य होऊन बसलेले असतात. त्यांच्या डोळ्यांसमोर त्यांच्या पत्नीचा अपमान होत असताना ते हात चोळत बसण्यापलीकडे काही करू शकत नाहीत. ज्यावेळी आपल्या पत्नीच्या पदराला कोणी हात घालते आहे अशा वेळी राजशिष्टाचार, द्युताचे नियम इत्यादी सगळ्या गोष्टी बाजूला सारून भीम, अर्जुन यांच्यासारखी धुरंदर मंडळी उभी राहिली असती तर पुढील महाभारत कदाचित घडले नसते. शेवटी द्रौपदीचा कृष्ण सखा मदतीला धावतो.

हे सगळे पाहून अस्वस्थ व्हायला होते. ज्याप्रमाणे श्रीकृष्णाने गीता फक्त अर्जुनाला सांगितली नाही. अर्जुन हा निमित्त आहे परंतु गीतेचा उपदेश हा सर्वांसाठी आहे. त्याचप्रमाणे मला असे वाटते की हा द्रौपदी वस्त्रहरणाचा प्रसंग केवळ द्रौपदी पुरता मर्यादित राहत नाही द्रौपदी ही प्रातिनिधिक आहे. ती केवळ ऐतिहासिक व पौराणिक व्यक्तिरेखा म्हणून सोडून देता येणार नाही. ती जगातील सगळ्या स्त्रियांची प्रतिनिधी आहे. दुर्योधनादि कौरव सोडले तर दरबारात बसलेली सगळी मंडळी म्हणजे सज्जन मंडळी आहेत असे म्हणूया. हे तथाकथित सज्जन देखील सार्वकालिक सज्जनांचे प्रतिनिधी आहेत असे मला वाटते आणि अशा सज्जनांचे मौन किंवा त्यांची निष्क्रियता समाजासाठी किती घातक आहे याचे हे इतिहासाने दिलेले तेव्हापासूनचे उदाहरण आहे.

द्रौपदी वस्त्रहरणाचा महाभारतातील हा प्रसंग केवळ एका स्त्रीच्या अपमानाची कथा नाही, तो समाजातील सज्जनांच्या निष्क्रियतेचा आरसा आहे. अन्याय करणारा दुर्जन नक्कीच दोषी असतो; पण त्याच्याइतकाच दोष त्या सज्जनांचाही असतो, जे आपल्या डोळ्यासमोरअन्याय घडत असताना शांत बसलेले दिसतात. अशावेळी त्यांनी घेतलेल्या शिक्षणाचा, त्यांच्या पराक्रमाचा काय उपयोग! त्यांचे शिक्षण व्यर्थच म्हणायचे!

आता आपल्या लज्जा रक्षणासाठी कोणी येणार नाही हे जेव्हा द्रौपदीला लक्षात आले, तेव्हा तिने अनन्य स्वराने श्रीकृष्णाचा धावा केला. त्याला आर्त हाक मारली. द्रौपदीचा हा सखा त्या हाकेला प्रतिसाद देत धावून आला आणि त्याने तिची लाज वाचवली. तिच्या साडीचे अंतहीन वस्त्र झाले. तिचे वस्त्र ओढणारे हात थकून जमिनीवर पडले आणि भर दरबारात तिचे जे वस्त्रहरण होणार होते ते टळले.

त्या प्रसंगी संकटाच्या क्षणी श्रीकृष्ण धावून आले. आजही ते तसेच येतील का? त्यांची वाट पाहायची का? आजच्या काळात तसे होणे शक्य आहे का?

आजच्या या काळात कोणा अबलेच्या आर्त हाका ऐकून श्रीकृष्ण धावून येतील आणि तिची दुष्टांच्या तावडीतून सुटका करतील अशी अपेक्षा करणे व्यर्थ आहे.

आजची परिस्थिती वेगळी आहे. आज प्रत्येक सज्जन माणसालाच स्वतःमध्ये कृष्ण जागवावा लागेल. आपण भगवद्गीता वाचतो. अनेकदा तिचे पारायणही करतो. तिच्या श्लोकांचा आदर करतो. पण गीतेचा संदेश केवळ वाचण्यासाठी नाही; तो आचरणात आणण्यासाठी आहे. अन्यायासमोर उभे ठाकणे, दुर्बलांच्या पाठीशी उभे राहणे आणि अधर्माला विरोध करणे हाच गीतेचा खरा अर्थ आहे. आपल्या कर्तव्यापासून च्युत झालेल्या अर्जुनाला कर्मप्रवृत्त करणे हाच गीतेचा उद्देश होता आपल्याला देखील गीता कर्म प्रवण करते.

समाजात अनेक ठिकाणी स्त्रियांवर वेळोवेळी अन्याय होतो. कधी घराच्या चार भिंतीत, कधी भर रस्त्यावर, तर कधी तिच्या कार्यक्षेत्रात. अशा वेळी अनेकदा सभोवताली उभे असलेले (सज्जन) लोक गप्प राहणे पसंत करतात. सत्तेची भीती, पैशाचा मोह किंवा स्वतःच्या सुरक्षिततेची चिंता या कारणांमुळे सज्जन लोक मौन बाळगतात.

पण इतिहास सांगतो की समाजाचे सर्वांत मोठे नुकसान दुर्जनांच्या शक्तीने होत नाही; ते सज्जनांच्या मौनामुळे होते. लोकशाहीत जेव्हा निवडणुका होतात, तेव्हाही बऱ्याचदा सज्जनशक्ती मौन राहते त्यामुळेच नको असलेल्या व्यक्ती सत्तेवर येण्याचा धोका असतो.

८ मार्चला जागतिक महिला दिन साजरा होतो आहे. त्या दिवशी आपण स्त्रीशक्तीचा गौरव करतो, तिच्या कर्तृत्वाचा सन्मान करतो. तिचे अभिनंदन करून मोकळे होतो. परंतु तिचा खरा सन्मान केवळ अभिनंदनाच्या संदेशांत नाही. तो त्या वेळी सिद्ध होतो, जेव्हा अन्यायाच्या प्रसंगी समाजातील सज्जन लोक धैर्याने उभे राहतात. असे जेव्हा होईल तेव्हाच स्त्रीला आपण सुरक्षित असल्याचा विश्वास निर्माण होऊ शकेल. एक व्यक्ती म्हणून तिला तिचे अधिकार देणे ही त्या पुढची पायरी आहे.

वर उल्लेख केलेला महाभारतातील प्रसंग आपल्याला सांगतो की सज्जनांचे मौन हेही अनेकदा अधर्माला बळ देणारे असते. आजच्या काळात श्रीकृष्ण प्रत्यक्ष येणार नाहीत. कारण त्यांनी गीतेच्या माध्यमातून विवेकाची ज्योत आपल्या हातात दिली आहे.

आता सज्जनशक्ती हीच कृष्णशक्ती व्हावी ही काळाची गरज आहे. कदाचित स्त्रीसन्मानाचा खरा उत्सव तेव्हाच साजरा होईल, जेव्हा समाजातील सज्जनांचे मौन तुटेल.

© श्री विश्वास देशपांडे

चाळीसगाव

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ मनाचे श्लोक – एक सार्वकालिक ‘मनोपनिषद’… – श्लोक ७ आणि ८ ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्री विश्वास देशपांडे

? इंद्रधनुष्य ?

☆ मनाचे श्लोक – एक सार्वकालिक ‘मनोपनिषद’… – श्लोक ७ आणि ८ ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्लोक ७ – –

मना श्रेष्ठ धारिष्ट्य जीवी धरावे |

मना बोलणे नीच सोशीत जावे |

स्वये सर्वदा नम्र वाचे वदावे |

मना सर्व लोकांसि रे निववावे |७ |

अर्थ : हे मना तू धीराचा अंगीकार कर म्हणजेच तुझ्या ठायी धैर्य असू दे. लोकांनी निंदा किंवा टीका केली तरी ती सहन कर. बोलताना नेहमी नम्रतेनेच बोल आणि आपल्या बोलण्याने आणि वागण्याने लोक संतुष्ट होतील असे वाग.

या श्लोकात समर्थांनी मनाला फार सुंदर उपदेश केला आहे. तो लक्षात घेण्याआधी मागील श्लोकाचा संदर्भ घेऊया. मागील श्लोकात समर्थ म्हणतात,” साधकाने काम क्रोध मोह इत्यादी विकारांपासून दूर राहिले पाहिजे.” अर्थात हे दूर राहणे सोपे नाही. त्यासाठी काय करायला हवे ते समर्थ या श्लोकात आपल्याला सांगतात. समर्थ म्हणतात, “आपण धैर्याचा अंगीकार करायला हवा. जीवनामध्ये अनेक संकटे येतात, मोहाचे प्रसंग येतात, आपली परीक्षा पाहणारे प्रसंग येतात. या सगळ्या प्रसंगामध्ये आपले मानसिक धैर्य टिकवून ठेवणे आवश्यक असते. ही एक प्रकारची साधना आहे जी सरावाने जमू शकते.

ज्याला प्रवाहविरुद्ध पोहायचे आहे आणि काही विशेष कर्तृत्व करून दाखवायचे आहे, त्याच्या अंगी धैर्य तर हवेच ! छत्रपती शिवाजी महाराजांना लढाईमध्ये काही वेळा माघारही घ्यावी लागली. प्रत्यक्ष श्रीकृष्णाला देखील रणांगणातून पळ काढावा लागला. स्वामी विवेकानंदांना देखील अनेक समस्यांचा, टीकेचा, नींदेचा सामना करावा लागला. परंतु या सगळ्या महापुरुषांनी कठीण परिस्थितीतही आपले धैर्य टिकवून ठेवले. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम यांच्यासारख्या संतांना तर केवढी लोकनिंदा सहन करावी लागली परंतु  आपण अंगीकारलेले समाजप्रबोधनाचे कार्य ते करीतच राहिले.

अशा महापुरुषांना निंदा आणि स्तुती, सुख आणि दुःख समान असतात. त्यामुळे ते विचलित होत नाहीत. रामाला राज्याभिषेक होणार होता. तो त्याच्या जीवनातील अत्यंत आनंदाचा प्रसंग होता. परंतु दशरथाने कैकयीला दिलेल्या वरामुळे त्याला वल्कले धारण करून वनवासात जावे लागले. परंतु याही परिस्थितीत त्याने आपले धैर्य आणि आनंदी वृत्ती सोडली नाही. आणि अशाही परिस्थितीत भरताला माता कैकयीकडे दुर्लक्ष करू नकोस असे सांगण्यास तो विसरला नाही. म्हणूनच महापुरुषांचे जीवन म्हणजे दीपस्तंभ असतात. कोणत्या परिस्थितीत कसे वागावे याचा वस्तूपाठ ते आपल्याला घालून देतात. म्हणूनच ते गुण अगदी धारण करण्यासाठी समर्थ आपल्याला तोच उपदेश करतात.

माणसाला स्तुती आवडते परंतु जेवढ्या सहजतेने आपण स्तुतीचा स्वीकार करतो तेवढ्याच सहजतेने निंदेचा करू शकत नाही. त्यासाठी धैर्य लागते. म्हणूनच समर्थ म्हणतात मना बोलणे नीच सोशीत जावे. या ठिकाणी धैर्याचा आणि टीका सहन करण्याचा दुसराही एक अर्थ घेता येईल. तो म्हणजे मनावर संयम राखणे, प्रतीक्षा करणे. प्रत्येकाच्या जीवनामध्ये काही एक काळ असा येतो की त्या प्रसंगामध्ये त्याला मनावर संयम ठेवून कठीण प्रसंगांना तोंड द्यावे लागते. आजच्या पिढीत हा संयम, हे धैर्य कमी होताना दिसते आहे. तरुण अपयशाचा स्वीकार आणि अपमानाचा सामना सहजपणे करू शकत नाहीत. जी गोष्ट आपल्याला हवी आहे ती मिळायलाच हवी ती नाही मिळाली तर ते एक तर खचून जातात किंवा हिंसक बनतात. अशी अनेक उदाहरणे आपण व्यवहारात पाहतो. म्हणूनच धैर्य अंगीकारणे, अपमान सहन करणे याचे प्रशिक्षण मनाला देणे आवश्यक आहे. ती वृत्ती अंगी बाणवावी लागते. मुलांना सुद्धा आई-वडिलांनी कठीण परिस्थितीचा सामना करणे, संकटात खचून न जाणे आणि अपयश आले तरी त्यातून पुन्हा उभे राहण्याची हिंमत ठेवणे या गोष्टी शिकवायला हव्यात. क्रिकेटसारख्या किंवा अन्य खेळांमधूनही अशा प्रकारची वृत्ती आपल्याला शिकायला मिळते. एखादा सामना हरला तरी निराश न होता, खेळाडू पुढचा सामना कसा जिंकता येईल त्या तयारीला लागतात. या सगळ्या गोष्टींमध्ये यश आणि अपयश सहजपणे कसे स्वीकारायचे याचे सुंदर शिक्षण आपल्याला मिळते.

जीवनामध्ये वागताना नम्रतेने बोलणे आवश्यक आहे. तसे संस्कार लहानपणापासून व्हायला हवेत ओल्या मातीच्या गोळ्याला हवा तसा आकार देता येतो म्हणूनच पालकांनी तसे आपल्या मुलांना संस्कार द्यायला हवेत. ही नम्रता आतून घ्यायला हवी. ती मनाची वृत्ती व्हायला हवी. बऱ्याच वेळा आजच्या कार्पोरेट जगामध्ये काही लोक कृत्रिम नम्रता किंवा विनय धारण करताना दिसतात. परंतु त्या गोष्टी मनापासून नसतील तर त्या गोष्टी म्हणजे एक प्रकारचे ढोंगच !

श्रीकृष्ण, श्रीराम यांचे सर्वांशी वागणे-बोलणे कसे होते हे पालकांनी गोष्टीतून मुलांना शिकवायला हवे. त्यांच्याजवळ ज्ञान होते, सामर्थ्य होते. परंतु तरी देखील त्यांनी आपली नम्रता सोडली नाही. संत तुकाराम महाराज म्हणतात,” नम्र झाला भुता, त्याने कोंडीले अनंता.” त्याचे तात्पर्य हेच आहे. आपल्या बोलण्याने दुसऱ्याचे समाधान झाले पाहिजे, दुसरी व्यक्ती संतुष्ट झाली पाहिजे अशा पद्धतीने बोलता आले पाहिजे. आपले म्हणणे दुसऱ्याला न दुखवता देखील उत्तम पद्धतीने सांगता येते. या गोष्टी वरील महापुरुषांच्या उदाहरणांकडे पाहिले तर आपल्या सहज लक्षात येतात.

या श्लोकात समर्थांनी धैर्य, संयम, नम्रता आणि गोड बोलणे ही आपल्या जीवनाला दिशा देणारी चतु:सूत्री दिली आहे. ती आपण लक्षात घ्यायला हवी.

स्वसंवाद: 

  • संकटसमयी माझे मन स्थिर राहते का, की लगेच खचते ?
  • टीका झाली तर मी संतुलित राहू शकतो का ?
  • माझ्या वागण्या, बोलण्यात नम्रता आणि सौजन्य आहे का ?
  • माझ्या बोलण्याने लोक संतुष्ट होतात का ?

– – –

श्लोक ८ वा – – – 

देहे त्यागिता कीर्ति मागे उरावी |

मना सज्जना हेचि क्रीया धरावी |

मना चंदनाचे परी त्वां झिजावे |

परी अंतरी सज्जना नीववावे |८|

अर्थ : हे मना ( सज्जन माणसा ), तुझी वागणूक अशा प्रकारे असू दे की मृत्यू पावल्यानंतरही तुझी कीर्ती मागे राहील. सुगंध देण्यासाठी चंदन ज्याप्रमाणे स्वतःला झिजवते अशाच प्रकारे तू देखील इतरांसाठी झिजून सज्जनांना संतोष होईल अशा प्रकारे वागावे.

माणसाचा देह नाशिवंत आहे. जो जन्माला आला त्याला एक दिवस मृत्यू निश्चित आहेच. जीवन आणि मृत्यू यांच्या दरम्यानचा कालावधी म्हणजे आपले आयुष्य. एखादी व्यक्ती किती जगली यापेक्षाही ती कशी जगली हे अधिक महत्त्वाचे. शंभर वर्षांचे दीर्घायुष्य मिळवून आपले आयुष्य मौजमजेत घालवणाऱ्या व्यक्तीपेक्षा अल्पायुष्य लाभलेल्या परंतु इतरांच्या सेवेत आपले जीवन घालवणाऱ्या व्यक्तीचे जीवन कधीही श्रेष्ठ ! स्वामी विवेकानंदांना उणेपुरे चाळीस वर्षांचे आयुष्य लाभले परंतु या आयुष्यात त्यांनी जी मानवतेची सेवा केली ती अनेक जन्म घेऊनही इतरांना करणे कठीण आहे. आपले आयुष्य सत्कारणी लावायचे असेल तर त्यासाठी इतरांसाठी झिजण्याची तयारी हवी.  एक सुंदर मराठी गीत आहे…

आनंद या जीवनाचा, सुगंधापरी दरवळावा

गाण्यातला सूर जैसा ओठांतुनी ओघळावा

झिजूनी स्वतः चंदनाने

दुसर्‍यास मधुगंध द्यावा…

शीतलता आणि सुगंध हे चंदनाचे गुण आहेत. ते इतरांना देण्यासाठी ते स्वतः झिजत असते. चंदन रोज सहाणेवर थोडे थोडे उगाळले जाते. असे करताना त्याची झीज होत असते. परंतु ही झीज सोसून ते इतरांना सुगंध आणि शीतलता प्रदान करते. आपण असेही म्हणतो की जे हात इतरांना सुगंध वाटतात, त्या हातांनाही सुगंध येतो. तो गंध त्यांना आपोआप प्राप्त होतो.

इतरांसाठी काही करायचे तर फक्त एक दिवस झिजून चालत नाही. ती सवय व्हावी लागते, वृत्तीला तसे वळण लावावे लागते. म्हणूनच समर्थ म्हणतात मना सज्जना हेचि क्रीया धरावी. अशा प्रकारचे सेवेमध्ये सातत्य असावे लागते. अशा प्रकारचे सातत्य जर आपल्या सेवेत आणि वागण्याबोलण्यात असेल तर त्यामुळे सज्जन म्हणजे समाजातील सदाचरणी लोक प्रसन्न होतात, संतुष्ट होतात.

समाजातील बऱ्याच लोकांकडे सत्ता आणि संपत्ती असते. त्यातील काही लोक आपल्या सत्तेच्या आणि संपत्तीच्या बळावर विविध संस्थांना देणग्या देऊन आपले नाव द्यायला लावतात. विविध प्रकारे प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न करतात. तशी ती त्यांना काही काळ मिळते देखील. इमारतीच्या फलकांवर किंवा दगडांवर त्यांचे नाव कोरले गेलेले असते. तरीदेखील काही काळानंतर अशा व्यक्ती विस्मृतीत जातात. परंतु कोणत्याही प्रकारचा स्वार्थ किंवा प्रसिद्धीची हाव न धरता जे सातत्याने समाजासाठी झिजत असतात, अशा व्यक्तींचे नाव समाज कायम आदराने घेत असतो. अशा व्यक्तींचे नाव समाजाच्या मनात कोरले जाते. त्याला कायमस्वरूपी आदराचे स्थान असते. अहिल्याबाईंनी आपला राज्यकारभार करत असताना समाजासाठी घाट बांधले, अन्नछत्रे पाणपोया उभारल्या. यासारखी विविध प्रकारची कामे केली आणि त्यासाठी पैसा खर्च केला. त्यामुळे आपण आजही त्यांचे नाव आदराने घेतो. इतरांची नावे विसरली जातात. म्हणूनच त्यांची कीर्ती आजही जिवंत आहे.

समर्थांचा संदेश स्पष्ट आहे —

.. .. ..  कीर्ती मागे राहावी असे वाटत असेल तर आयुष्य इतरांसाठी झिजवले पाहिजे. आणि हे झिजणे एकदाच नव्हे, तर वृत्ती म्हणून अंगीकारले पाहिजे.

“मना सज्जना हेचि क्रीया धरावी” —

.. .. .. ही कृती, ही वृत्ती, ही सातत्यपूर्ण सेवा — हाच खरा साधनेचा मार्ग आहे.

स्वसंवाद :

  • मी केवळ स्वतःसाठी जगतो आहे की इतरांसाठी झिजून त्यांनाही आनंद देण्याचा प्रयत्न करतो आहे ?
  • माझ्या कृतींमागे प्रसिद्धीची अपेक्षा आहे का, की निखळ सेवाभाव ?
  • हा सेवाभाव मी एक वृत्ती म्हणून अंगीकारला आहे का ?
  • माझ्या वागण्याने किंवा सेवाभावाने समाजातील सज्जन किंवा सदाचरणी लोक संतुष्ट होतात का ?

– क्रमशः श्लोक ७ आणि ८ .   

© श्री विश्वास देशपांडे

चाळीसगाव

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “ऑपरेशन ईश्वर!” “ऑपरेशन ईश्वर!” – भाग – २ ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य 

☆ “ऑपरेशन ईश्वर!” – भाग – २  ☆ श्री संभाजी बबन गायके

‘ऑपरेशन ईश्वर ! ‘ 

            ’भारतीय सैन्यावरची अनुभवसिद्ध ‘ईश्वर’कृपा !

(दहा जवान होते..त्यांतील पाच जण त्या जागी विविध ठिकाणी पेरून बसवले आणि इतरांसोबत रोड ओपनिंग चे काम करावे असे ठरले. रात्र झाली…उजाडले….सोबत आणलेल्या पुरी-भाजी खाऊन जवान ताजेतवाने झाले!) 

इथून पुढे – – – 

आणि…नेमके ईश्वरसिंग ज्या बाजूला बसले होते त्याच रस्त्याने काल अतिरेक्यांना रस्ता दाखवायला गेलेला तो सी.आर.पी.एफ.जवान खाली उतरताना दिसला. त्याने अतिरेकी वर चढून गेल्यानंतर खाली दरीत असलेल्या भागात असलेल्या एका धार्मिक स्थळाजवळ असलेल्या झाडीत लपून बसलेत!

आता वरून खाली गेलो तर ते खालून गोळीबार करतील….त्यासाठी त्यांच्यापासून मागच्या बाजूला असलेल्या डोंगरावर पाठीमागच्या बाजूने चढून तिथून खाली येणे…ही योजना झाली! एक तुकडी घेऊन जायचे ठरले….आणि ते अतिरेकी निसटून जाऊ नयेत म्हणून दोन रस्त्यांत काही सैनिक तैनात केले! 

पथक काही मीटर्स वर चढले…आणि वरून खाली उतरू लागले! बरेच खाली आले तरी अतिरेकी नजरेस पडेनात….ईश्वरसिंग यांचे सोबत एकूण चार लोक होते…..बाकीचे तिघे त्यांनी मशीन गन देऊन एका उंच जागी थांबवून ठेवले होते..गरज पडली तर फायर सपोर्ट देण्यासाठी. 

दहा-वीस मीटर्स खाली उतरताच सर्वांत पुढे असलेल्या नेमबाज सैनिकाला एका झाडाच्या जवळ दोन पहारेकरी उभे असलेले दिसले…त्यांची तोंडे विरुद्ध दिशेला होती…त्या दोघांत बरेच अंतर होते. ईश्वर सिंग साहेबांनी पुढच्या सैनिकाला हळूच सांगितले….वो दूर वाला मैं उडाता हूं…तू यह नजदीकवाला ले ले! आणि दोघांनीही एकेका गोळीत ते दोघे यमसदनी धाडले….तिसरा समोर आला….त्यालाही या दोघांना सोबत म्हणून वर पाठवले! बाकीचे सात मागे पळाले…..आणि एका कपारीत लपून ईश्वर सिंग साहेबांच्या पथकावर गोळीबार करू लागले…पण त्यांना नेम साधता येत नव्हता! ….आर.एल.अर्थात rocket launcher गन! ईश्वरसिंग साहेबांनी मेसेज देऊन आर.एल.मागवली…त्यांचे वरिष्ठ अधिकारी ते हत्यार घेऊन तिथवर पोहोचले! पण तोवर अतिरेक्यांचा गोळीबार थांबला होता. वरिष्ठ म्हणाले….बाकीचे पळून गेले असतील…त्यावर अनुभवी ईश्वर सिंग म्हणाले….त्यांचे रस्ते अडवून ठेवले आहेत मी…..बाकीचे सात इथंच कुठं तरी लपून बसलेत. त्यावर ते साहेब आणि ईश्वर साहेब आणखी तीन चार जवान घेऊन संभाव्य जागेला वळसा घालून जवळ गेले! तीन अतिरेकी मरून पडलेले. त्यांची एक रायफल ईश्वर सिंग साहेबांनी सोबत आलेल्या सी.आर.पी.एफ.वाल्या सैनिकाच्या हाती दिली! आता दोन वेगवेगळे गट बनवून त्या जागेला घेरण्याचा प्रयत्न करण्याचे ठरले. वरिष्ठ अधिकारी दोन-तीन सैनिक घेऊन एका बाजूने तर ईश्वर सिंग एका बाजूने निघाले. तेवढ्यात त्या वरिष्ठ साहेबांच्या दिशेने जबरदस्त गोळीबार झाला! हा तर PIKA मशीनगनचा फायर..ईश्वरसिंग साहेबांनी अनुभवाने जाणले! मिनिटाला शेकडो गोळ्या डागणारे हत्यार…पण वरिष्ठ साहेब त्यातून बचावले…..परंतु काहीवेळाने आणखी पुढे सरकताच त्यांच्यावर चायना मेड हातगोळा पडला आणि ते दोन साथीदारांसह जखमी झाले! हाती घेतलेली मोहीम तर फसल्यासारखीच होती. आणखी मोठ्या साहेबांना मेसेज करून हेलीकॉप्टरची मागणी केली…पण त्या भागात हेलीकॉप्टर नेणे धोक्याचे होते. उच्च अधिका-यांनी रस्ते मार्गाने वैद्यकीय मदत पाठवण्याचा निर्णय घेतला! दुर्दैवाने सोबत आलेला सी.आर.पी.एफ.वाला सैनिक PIKA फायरमध्ये सापडला आणि कामी आला! कवर फायर घेत ईश्वर सिंग यांनी दोन जखमी आणि त्या हुतात्मा सैनिकाचा मृतदेह तिथून खाली पाठवण्यात यश मिळवले!  

ईश्वर सिंग म्हणाले…साहेब…मी मोहीम अर्धवट सोडून येऊ इच्छित नाही! आणि त्यांनी परत जाऊन नवीन योजना आखली! तोवर त्यांचे सर्वांत वरिष्ठ साहेब तिथे पोहोचले….त्यांनी सोबत एक सैन्य पथक आणले होतेच. त्यांनी ईश्वर सिंग यांना त्यांच्या जागेवरून मागे येण्याची सूचना दिली. अतिरेकी लपल्याची जागा आणि मी यात फारसे अंतर नाही….मी जर मागे फिरलो…तर ते आम्हांला सहज उडवू शकतील…त्यामुळे मी इथंच थांबून कारवाई करीत राहणार आहे! तोवर आपल्याकडील तीन सैनिक हुतात्मा झाले होते…..साहेब म्हणाले….मागे या..आपल्याला आणखी नुकसान नको आहे! त्यावर ईश्वर सिंग यांनी आपला निर्धार असून आता कोणाला काहीही होऊ देणार नाही,असे सांगितले! 

ईश्वर सिंग पुन्हा कामाला लागले…..तिकडून PIKAचा जबरदस्त फायर सुरु झाला…जोवर पिका शांत होत नाही तोवर काहीही करण्यासारखं नव्हतं! पण एवढ्यात PIKA शांत झाली…तिच्यातल्या गोळ्यांचा पट्टा संपला…गोळ्यांचे पट्टे असलेली पिशवी अतिरेक्यांनी शेजारच्याच खडकावर ठेवली होती…..PIKAवाल्याने ते पिशवी घेण्याच्या प्रयत्नात ती पिशवी खाली पडली….ती घेण्यासाठी तो थोडा पुढे वाकला….ईश्वर सिंग साहेबांनी निशाणा साधला…..फौजेत आल्यापासून ईश्वर सिंग फायरींग स्पर्धेत कधीच दुस-या क्रमांकावर राहिलेले नव्हते…कायम नंबर एक. तो अतिरेक्याचे डोके केवळ एखाद दोन सेकंदासाठी दिसले असेल….तितका वेळ तर खूप होता….हेड शॉट अचूक! आतापर्यंत दहापैकी चार झालेले होते…दुस-याच मिनिटाला पाचवाही घेतला…..साहेबांना सांगितले….पाच झाला स्कोर. साहेब म्हणाले…आता पुरे झाले…मागे फिरा! नाही साहेब….आणखी पाच आहेत..त्यांना संपवूनच येणार! 

गोळ्या पुरवून पुरवून वापरा असा आदेश ईश्वर सिंग यांनी सैनिकांना दिला….आता गवतात लपलेले पाच जण उरले होते….गवत जरासे जरी हलले तरी फायर करा…साहेब म्हणाले……काही मिनिटांमध्ये त्या गवतात पाच मृतदेह मिळून आले…..दहाचा हिशेब लागला होता! 

नायब सुबेदार ईश्वर सिंग यांनी आपले शब्द खरे करून दाखवले होते…आयुष्यभर सैन्यात कमावलेला सारा अनुभव वापरला…..प्रसंगी वरिष्ठ अधिका-यांकडे हट्ट धरला…स्वत:चा जीव धोक्यात टाकला…पण हाती आलेले दहा अतिरेकी अजिबात हातचे जाऊ दिले नाहीत! त्या अतिरेक्यांचे मृतदेह तिथून वर आणायचे आदेश मिळाले…पण ईश्वर सिंग म्हणाले….हे काम यावेळी अशक्य आहे…जवान कमी आहेत. शेर किसने मारा? जिसने कान,पूंछ काट ली….या चालीवर मी त्यांची शस्त्रे घेऊन वरती येतो! त्यानुसार त्यांनी केलेही! 

दुसरे दिवशी गावक-यांना हाताशी घेत, दहा चारपाई खाटा घेतल्या..त्यावरून ते मृतदेह जागेवरून उचलून आणले. त्यांचे POST MORTEM केले गेले आणि व्यवस्थित दफन विधीही आपल्या लष्कराने करवून घेतला..अगदी त्यांच्या धार्मिक पध्दतीनुसार! वरिष्ठ अधिका-यांनी या मोहिमेला ऑपरेशन ईश्वर असेच दिले होते त्यांच्या पातळीवर! एका सैनिकासाठी तर हा मोठाच पुरस्कार होता! आणि पुढे लवकरच भारताचे तत्कालीन राष्ट्रपती महोदय डॉक्टर ए.पी.जे.अब्दुल कलाम साहेब यांच्या शुभहस्ते कीर्ती चक्र दिले गेले! अगदी सैनिक होण्यासाठीच जन्माला आलेले ईश्वर सिंग यांनी त्यांच्या संपूर्ण कारकीर्दीत अतिशय जबरदस्त सैन्य सेवा बजावली. हे सैनिकच भारतीय सैन्याची खरे सामर्थ्य आहेत…त्या सर्वांना मन:पूर्वक नमस्कार….वंदन.

(MONKS AND WARRIORS आणि तत्सम online platforms/ youtube channels वर ईश्वर सिंग साहेबांच्या मुलाखती नुकत्याच प्रसिद्ध झाल्या. त्यात साहेबांची कामगिरी सविस्तरपणे समजावून घेण्यासारखी आहे. ही पेजेस हिंदी,इंग्लिश मध्ये असल्याने मराठी वाचक त्यापासून वंचित राहतो…म्हणून मी हा उपक्रम हाती घेतला आहे. COPYRIGHT ISSUES आहेतच. पण ही माहिती सर्वसामान्य जनतेपर्यंत प्रभावीपणे गेली पाहिजे…ही यामागची भावना आहे. जयहिंद.) 

 समाप्त –  

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ।। श्री नारद उवाच ।। – नारद भक्ति सूत्रे — सूत्र क्र. ४८ आणि ४९. ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ☆

श्री संदीप रामचंद्र सुंकले

? इंद्रधनुष्य ?

।। श्री नारद उवाच ।। – नारद भक्ति सूत्रे — सूत्र क्र. ४८ आणि ४९. ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले 

।। श्री नारद उवाच ।। 

नारद भक्ती सूत्र क्र. ४८ आणि ४९.

भक्तीसूत्र ४८…

यः कर्मफलं त्यजति, कर्माणि संन्यस्यति, ततो निर्द्ंवद्वो भवति ॥४८॥

अर्थ : जो कर्मफलाचा त्याग करतो, सर्व कर्मांचाही त्याग करतो, त्यामुळे तो द्वंद्वरहित होतो, अर्थात मायेच्या पलिकडे जातो.

विवेचनमागील सूत्रात जो योगक्षेमाचाही त्याग करतो, जो निर्मम होतो, संगांचा त्याग करतो तो मायेतून तरून जातो असे सांगितले, या सूत्रात आणखी तीन साधने सांगतात. प्रथम कर्मफलत्याग सांगितला आहे. या साधनाचा मागील साधनाशी संबंध आहे. मानवप्राणी हा या जगात येतो तो कर्ता म्हणून येतो. कर्तृत्वाबरोबर येणारा दुसरा धर्म म्हणजे कर्मफलाचे भोक्तृत्व हा आहे. कोणीही जे कर्म करत असतो ते निष्फळ जावे म्हणून करीत नाही तर त्याचे फळ भोगावयास मिळावे याच हेतूने करीत असतो. यासच फलासक्ती म्हणतात. अशा आसक्तीने मानव कर्मे करतो. जर फल न मिळेल अथवा त्या फलाची आसक्ती नसेल तर कर्मे करण्याकडे प्रवृत्ती होणे कठीण आहे, हे जरी खरे आहे तरी जीव जो कर्मात अडकतो तो या फलासक्तीमुळेच. मी कर्ता हा अभिमान म्हणून मीच या कर्माचे फळ भोगावे ही आसक्ती, यासच कर्माचा बंध म्हणतात, असे श्रीज्ञानेश्वर महाराज सांगतात.

“तैसा कर्तृत्वाचा मदु । आणि कर्मफळाचा आस्वादु । या दोहींचें नांव बंधु । कर्माचा कीं ॥”

(ज्ञान. १८. २०५)

या फलासक्तीतूनच पुढे रागद्वेषादी विकार, अनुकूल-प्रतिकूल भावना, इत्यादी निर्माण होतात. त्यातल्या त्यात संसारी माणसाची सकाम कर्माकडे विशेष प्रवृत्ती होते ती आणखीही बंधनाला कारण होते. मनुष्याला जन्ममरण प्रवाहात वाहत जावे लागते त्याचे कारणही हे कर्मफळच आहे. याचा परिणाम असा होतो की मनुष्य असो वा साधक जन्म मरणाच्या फेऱ्यात अडकून पडतो. आणि मिळणाऱ्या प्रत्येक नव्या जन्मात पुढील जन्माची बेगमी करतो.

माउली म्हणतात,

वृत्ती{ऐ}सें मन धरिती । मना{ऐ}सी क्रिया करिती । केलिया ऐसी वरीती । मरोनि देहें ॥

(ज्ञान. १७. ५८)

ज्याला मायेतून तरून जावयाचे आहे त्याला फलासक्ती ठेवता येणार नाही. कारण तोही एक मायापरिणामच आहे. म्हणून विवेकी साधक हळूहळू मायेच्या जाळ्यातून सुटण्याकरिता एक एक बंध तोडून टाकण्याचा प्रयत्न करीत असतो. त्यातच ‘कर्मफलंत्यजति’ याचा अंतर्भाव होतो.

कर्माचे चार प्रकार आहेत. नित्य, नैमित्तिक, काम्य व प्रायश्चित्त. त्यांत साधकाने काम्य कर्मे करू नये असे सांगितले जाते. ज्ञात-अज्ञात पातकक्षालनाकरिता प्रायश्चित्त कर्मे करावीत व नित्यनैमित्तिक कर्मे न केली तर प्रत्यवाय आहे, म्हणून ती टाकू नयेत. अशा प्रकारे जर कर्मे करील तर तो कर्मत्यागीच मानला जाईल. मात्र ती कर्मे निरहंकार वृत्तीने कर्तृत्वमद व फलाशा टाकून करावीत. प्रारब्धाने आलेली किंवा आपली विहित कर्मे अवश्य करावीत. त्यांचा त्याग करणे उचित नाही असे माउली म्हणतात.

“जे उचित कर्म सांडिती । मग नैष्कर्म्य होऊं पाहती ।परी कर्मेंद्रियप्रवृत्ती । निरोधुनी ॥ तयां कर्मत्यागु न घडे । जें कर्तव्य मनीं सांपडे ।वरी नटती तें फुडें । दरिद्र जाण ॥”

(ज्ञा. ३. ६४/६५)

तीन प्रकारचा कर्मत्याग गीतेमध्ये सांगितला आहे.

१. वेद, ईश्वर, परलोक यावर विश्वास न ठेवणारा तमोगुणी पुरुष अविवेकाने जो विहित कर्माचा त्याग करतो तो तमोगुणी त्याग होतो.

२. शरीराला फार कष्ट होतात, दुःख होते या भीतीने जो कर्मत्याग केला जातो त्यास राजस त्याग म्हणतात

३. जो मनुष्य/साधक आपल्या वाट्याला आलेले विहित कर्म कर्तृत्वमद व फलास्वादाची अभिलाषा टाकून करतो त्यास सात्त्विक त्याग म्हणतात.

कर्मत्यागाचे एक सोपे सूत्र सांगता येईल. एखाद्या कंपनीत मनुष्य नोकरी करत असतो. तेथील अधिकारी जे काम त्याला सांगतो, त्यानुसार तो मनुष्य ते काम करीत असतो. त्या कामातून होणाऱ्या लाभहानीकडे त्याचे फार लक्ष नसते. सांगितलेल्या कामात आपल्याकडून छोटीशीही चूक होऊ नये याची दक्षता तो मनुष्य घेत असतो. ते काम त्याने चोख केले की मालक/अधिकारी त्याला मासिक पगार देतो. आणि त्या व्यवसायात त्या मालकाला नफा झाला तर तो दिवाळीला भेटवस्तू (बोनस) पण देत असतो. इथे आपण भगवंताला आपले मालक करावे, त्याच्याकडे नोकरी करावी असे करता आले तर आपले काम अधिक सोपे होईल असे वाटते. संसारातील लाभ हानी स्वाभाविकपणे भगवंताची होईल. आपण त्यातून अलिप्त होऊ शकू. थोडक्यात मनुष्याने भगवंताच्या हातचे उपकरण बनून जावे. त्याला म्हणावं तू ठेवशील तसा राहीन, पण तुझाच बनून राहीन. एकदा कर्तेपण भगवंताकडे दिले (अगदी मनापासून) की लाभहानी हा विषयच रहात नाही. श्रीगोंदवलेकर महाराज म्हणतात की प्रपंच दाई सारखा करावा आणि परमार्थ आई सारखा करावा.

मायेच्या कचाट्यातून सुटण्यासाठी आणिक एक त्याग करावा लागतो, त्याचा विचार पुढील सूत्रात पाहू.

जय जय रघुवीर समर्थ 

 – – 

भक्तिसूत्र ४९

वेदानपि संन्यसति, केवलमविच्छिन्नानुरागं लभते ॥ ४९ ॥

अर्थ : जो वेदांनी सांगितलेल्या विधिनिषेधात्मक कर्मसमूहाचा त्याग करतो त्याला भगवंताच्या उत्तरोत्तर वाढ शुद्ध, अखंड, एकरस प्रेमाचा लाभ होतो. अर्थात, तो मायेपासून मुक्त होतो.

विवेचनमागील सूत्रात कर्मफले व ती प्राप्त होण्याकरिता केली जाणारी विहित कर्मे यांचाही तो भक्त त्याग करतो असे सांगितले आहे.

वेद हे अपौरुषेय आहेत. वेदांचे प्रामुख्याने चार अंगे आहेत. पहिले अंग आहे संहिता. दुसरे अंग आहे ब्राह्मण ग्रंथ आणि तिसरे आहे आरण्यके. चौथे आहे वेदांत.

संहितेमध्ये वेदकालीन देवतांचे मंत्र आले आहेत. ब्राह्मण ग्रंथात विविध यज्ञाबद्दल माहिती आलेली आहे तर तिसऱ्या भागात अर्थात आरण्यकात भगवंतासंबंधी चिंतन करून जे अनुभव घेतले, त्याचा उहापोह इथे आढळतो. चौथे आहे वेदांत, यात उपनिषदे येतात. या चारी अंगाचा अभ्यास अनेकांनी केला, पण वेदांचा अभ्यास केला, सर्व वेद तोंडपाठ केले म्हणून त्यांंना भगवंताची प्राप्ती झाली असे होत नाही. तर त्यातील मर्म लक्षात घेतले पाहिजे. श्रीसद्गुरू गोंदवलेकर महाराज सांगतात की साधकांमध्ये एक दुर्गुण अवश्य येतो. त्याला परमार्थ छान बडबडता येतो. एक उदा. पाहू. चार धाम यात्रेला जाण्यासाठी एक जण रेल्वेचे तिकीट काढायला गेला. त्याने तिकीट काढले. त्या तिकीट देणाऱ्या माणसाने त्या मनुष्याला चार धाम यात्रेचे संपूर्ण वर्णन करून सांगितले. तसेच कुठे काय करावे? कुठे खरेदी करावी? कोणते हॉटेल स्वस्त आहे? धर्मशाळा कुठे आहेत? ते सर्व सांगितले. या मनुष्याने त्या तिकीट देणाऱ्या मनुष्याला सहज प्रश्न केला की तुम्ही बरेच वेळा यात्रा केलेली दिसते. तर तो तिकीट विकणारा म्हणाला मी एकदाही यात्रा केली नाही. लोकांनी सांगितलेल्या माहितीवरून मी हे सर्व तुम्हाला सांगू शकलो. नुसती माहिती झाली म्हणून उपयोग होत नाही.

वेदांचा, अभ्यास करून मनुष्य नुसती पोपटपंची करणार असेल, तर त्याचा काय उपयोग? त्यात अनुभूती असणे अत्यंत महत्वाचे. इथे तुकाराम महाराजांचा एक अभंग आठवतो.

“वेदांचा तो अर्थ आम्हांसीच ठावा। येरांनी वाहावा भार माथां।”

संत तुकाराम महाराजांचा आणखी एक अभंग आहे.

“वेद अनंत अनंत बोलिला । अर्थ इतुकाचि साधिला ॥१॥ विठोबासी शरण जावें । निजनिष्ठे नाम गावें ॥२॥ सकळशास्त्रांचा विचार । अंतीं इतुकाचि निर्धार ॥३॥ अठरापुराणीं सिद्धांत । तुका ह्मणे हाचि होत ॥४॥”

कोणतेही तत्व नुसते पाठ करणे अपेक्षित नाही. तर त्याची अनुभूती घेतलेली असावी. तरच ते आपल्याला कळले असे होते. बाळ नीट चालायला शिकेपर्यंत पांगुळगाडा वापरतो. याच नियमाप्रमाणे ज्ञान प्राप्त करेपर्यंत ‘पांगुळगाडा’ वापरणे अपेक्षित आहे. आणि थोडे अधिक मोठे झाल्यावर त्या ‘पांगुळगाड्या’चा अभिमान न धरता त्याचा त्याग करणे अधिक उचित आहे. 

राग म्हणजे प्रेम. राग म्हणजे रंग. अनु म्हणजे मागे जाणे, अथवा… ला शोभणे. भक्ताचे भगवंतावरील प्रेम वाढत जाते, तेव्हा त्याला प्रेमाचा रंग लागला असे म्हटले जाते. भक्त मिरेला कृष्ण भक्तीचा रंग लागला होता, असे म्हटले जाते. साधकाचे असेच व्हावे. *या प्रेमाला अनुराग असे म्हणतात. भिंतीला रंग लागला की आधीचे रंग संपूर्णपणे नष्ट होत असतात. अर्थात त्या साधकाच्या वासना निर्बीज होत असतात. 

संत तुकाराम महाराज म्हणतात,

“प्रेम देवाचें देणें । देहभाव जाय जेणें । न धरावी मनें । शुद्धी देशकाळाची ॥१॥ मुक्त लज्जाविरहित । भाग्यवंत हरीभक्ती । जाले वोसंडत । नामकीर्तीपवाडे ॥२॥ जोडी जाली अविनाश । जन्मोनि जाले हरीचे दास । त्यांस नव्हे गर्भवास । परब्रह्मीं सौरस ॥३॥ हे चि वाहाती संकल्प । पुण्यप्रसंगाचे जप । तुका म्हणे पाप । गांवीं नाहीं हरीजना ॥४॥”

(अभंग क्रमांक ११५६, सार्थ तुकाराम गाथा, धार्मिक प्रकाशन संस्था)

असे प्रेम प्रत्येकाला लाभावे अशी सद्गुरूचरणी प्रार्थना.

जय जय रघुवीर समर्थ 

नारद महाराज की जय!!!

– भक्ती सूत्र क्र. ४८ आणि ४९.

© श्री संदीप रामचंद्र सुंकले (दास चैतन्य)

थळ, अलिबाग. 

८३८००१९६७६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “ऑपरेशन ईश्वर!” “ऑपरेशन ईश्वर!” – भाग – १ ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य 

☆ “ऑपरेशन ईश्वर!” – भाग – १  ☆ श्री संभाजी बबन गायके

नायब सुबेदार ईश्वर सिंग 

‘ऑपरेशन ईश्वर! ‘

’भारतीय सैन्यावरची अनुभवसिद्ध ‘ईश्वर’कृपा!

“साब, आप परमिश्शन दें या मत दें… मैं तो जा रहा हूं उप्पर! आप भी पिच्चेछेसे आ जावो क्यूआर्टी लेक्कर! ये तीन तो हमने खतम कर दिये हैं… ओर सात मिलीटेन्ट हैं! ”

नायब सुबेदार ईश्वर सिंग यांनी हे शब्द असे काही उच्चारले की, त्यांच्यापेक्षा अधिकाराने मोठ्या पण वयाने लहान असलेल्या त्यांच्या साहेबांना त्यांचा तो हट्ट मान्य करावाच लागला!

वयाच्या अठराव्या वर्षात असताना सैन्यात शिपाई म्हणून भरती झालेला हा हरियानवी छोरा जणू आईच्या पोटातूनच सैन्यविद्या शिकून आलेला असावा! खाशी हरियानवी भरभक्कम शरीरयष्टी आणि थेट, रोखठोक परखड बोली. ताठ चाल आणि तिखट नजर… आणि जिद्दी पण निर्मळ स्वभाव! भारतीय फौजेची वर्दी परिधान करून नीडरपणे देशरक्षण करताना सेवेची पंधरा वर्षे अत्यंत धामधुमीत व्यतीत केलेला हा रांगडा गडी, शिपाई-लान्स नायक-नायक-हवालदार अशा पाया-या चढत चढत ‘नायब सुबेदार’ पदापर्यंत पोहोचला होता. पण एका वाक्यात सांगता येणारी ही वाटचाल अतिशय खडतर होती. ऑपरेशन ब्लू स्टार, भारतीय शांतीसेनेच्या श्रीलंकेतील ‘ऑपरेशन पवन’मध्ये अचूक निशानेबाज म्हणून ईश्वरसिंग यांनी उत्तम कामगिरी बजावली होती. नागालॅंडमध्ये ते तेथील बंडखोरांशी लढून आलेले होते, पुढे सियाचीन ग्लेशियरवर त्यांनी यशस्वी पहारा दिला, एन. एस. जी. नॅशनल सिक्युरीटी गार्ड मध्ये त्यांनी एक नव्हे, दोन नव्हे तर तीनदा प्रोबेशन पूर्ण केले, यात सर्वोत्तम नेमबाज (best firer) म्हणून विशेष पारितोषिक पटकावले होते. (सेनेच्या विविध विभागातून निवडून निवडून घेतलेल्या एकूण प्रशिक्षणार्थी सैनिकांपैकी सुमारे ५० ते ८०% सैनिक प्रशिक्षण कालावधी पूर्ण करू शकत नाहीत… इतके हे प्रशिक्षण कठीण असते… एक प्रोबेशन पूर्ण करणे ही सुद्धा फार मोठी कामगिरी मानली जाते! ) तर ५, पॅराशूट रेजिमेंटमध्येही एक टर्म पूर्ण केली होती. कारगिल लढाईत शौर्य गाजवले होते… आणि हो… प्रत्येक शूर सैनिकाच्या सैनिकी जीवनातील अविभाज्य भाग म्हणजे जम्मू-कश्मीरमधील सेवा… ती ही घडली! “जिंदगी भर हमने फायरींग ही की है साब! ” असं जेंव्हा ईश्वर सिंग म्हणतात तेंव्हा त्यात जराशीही अतिशयोक्ती नसते… अचूक निशाणेबाजी हा त्यांच्या डाव्या हाताचा मळ जणू!

इतका प्रदीर्घ अनुभव घेतलेला सैनिक म्हणजे जणू कच्च्या लोहाचे पोलादात रुपांतर. अशा सैनिकास लष्करी भाषेत battle-hardened अशी संज्ञा आहे! आणि हे सैनिक सैन्याचा खड्गहस्त असतात! जनरल गिल साहेब, ब्रिगेडीअर करीअप्पा साहेब, मेजर युद्धवीर साहेब, कर्नल अभय साहेब इत्यादी मोठे लष्करी अधिकारी ईश्वर सिंग यांच्याबद्दल गौरवोद्गार काढतात ते काही उगीच नव्हे!

२००१… ऑपरेशन रक्षक सुरु होते. कारगिलमधील उंचावरील काही टेकड्या ताब्यात घेण्याची मोहिम आखण्यात आली होती. ईश्वर सिंग यांची पलटण यावेळी नुकतीच सियाचीन मधून परतली होती. त्यांना या मोहिमेत घेण्यात आले. परंतु अमेरिकेत ९ सप्टेंबरचा अतिरेकी हल्ला झाला आणि त्यामुळे बहुदा ही योजना स्थगित करण्यात आली. मग या पलटणीच्या प्रमुखांनी काश्मीर खो-यात परत जाण्याऐवजी राजौरी ते पुंछ मार्ग सुरक्षित करण्यासाठीची जबाबदारी मागितली.. आणि त्यांना एल. के. जी. अर्थात लोअर कृष्णा घाटी भागात सेनेचा मार्ग सुरक्षित करण्यासाठी रोड ओपनिंग पार्टीमध्ये काम करण्याचे कार्य सोपवले.

एका एका गटाला पाच पाच किलोमीटर्सचे काम विभागून देण्यात आले होते. ईश्वरसिंग यांच्या पुढे सुबेदार साहेबांचा एक गट कार्यरत होता. त्यांचे काम संपले की तिथून पुढे नायब सुबेदार ईश्वर सिंग साहेब यांच्या गटाला काम करायचे होते आणि निरोप येण्याच्या प्रतीक्षेत असतानाच त्यांच्या एका वरिष्ठाकडे, जे गुप्तवार्ता विभागात कार्यरत होते, त्यांच्याकडे एक स्थानिक माणूस आला. जिथे सुबेदार साहेबांचा गट काम करीत पोहोचला होता तिथल्या एका मोठ्या वळणावर एक नाला होता. त्या नाल्याच्या वरच्या बाजूला त्या व्यक्तीच्या भावाचे घर होते, आणि त्या घरात रात्रीपासून दहा पाकिस्तानी अतिरेकी जबरदस्तीने घुसून बसले होते. त्यांच्याकडे सहा एके-४७, एक पिका गन, दोन पिस्टलस आणि इतर काही दारुगोळा होता.

त्या भावाचा मुलगा सी. आर. पी. एफ. मधून सुट्टीवर आलेला असून त्याच्याकडे हत्यार नसल्याने त्याचाही नाईलाज झाला होता. त्या अतिरेक्यांकडे मोठी आधुनिक शस्त्रेही आहेत! ही खबर ईश्वर सिंग यांना दिली गेली… मग काय… साहेबांचे बाहू फुराफुरले! एकाच वेळी इतक्या मोठ्या संख्येने अतिरेकी हाती लागण्याची शक्यता होती… ही संधी सोडता कामा नये! पण त्यांनी खबर घेऊन आलेल्या त्या माणसाची उलटतपासणी घेतली… कारण दोनच दिवसांपूर्वी त्या भागात एक मोठे अधिकारी शोध घेऊन रिकाम्या हाती परतले होते… पण त्या माणसाने शपथेवर सांगितले की खबर पक्की आहे! यावर ईश्वर सिंग यांनी त्यांचे वरिष्ठ अधिका-याला परवानगी विचारली… आणि मी पुढे जातो… तुमच्याकडचे वीस जवान घेऊन तुम्ही मागून मदतीला या! असेही सांगायला ते विसरले नाहीत!

आणि मग दहा जवान सोबत घेऊन ईश्वर सिंग निघाले… त्या खबर देणा-या माणसाला सोबत घेतले होतेच… त्या घरापासून हे पथक काही मीटर्सवर असताना त्यांनी वर पाहिले तर एका झाडाजवळ एक व्यक्ती अंगावर घोंगडी पांघरून उभी होती… त्या अतिरेक्यांनी त्याच घरातल्या वृद्ध व्यक्तीला दमदाटी करून पहा-यावर उभे केले होते! आता ते अतिरेकी तिथून निश्चित पळून वरच्या बाजूला जाणार हे ईश्वर सिंग साहेबांनी ताडले. यांनी दुस-या बाजूने अधिक वर जाऊन वरून खाली खाली येत अतिरेक्यांचा शोध घेण्याची योजना आखली. काही वेळातच ते त्या घराजवळ पोहोचले… तर त्या घरात फक्त एक महिला आणि ती वृद्ध व्यक्ती होती. घरात पाकिस्तानातील कराची येथे बनलेली बिस्कुटसची पाकिटे दिसली… यावरून ते निश्चित पाकिस्तानीच होते, याची खात्री पटली. ईश्वर सिंग यांनी ती पाकिटे आणि त्यांच्या काही चीजवस्तू पुरावा म्हणून जप्त केल्या. तोवर त्यांचे वरिष्ठ अधिकारी वीस सैनिकांचे पथक घेऊन तिथवर पोहोचले! आता काही योजना आखणे गरजेचे होते. घरातल्या महिलेने सांगितले की अतिरेकी तिच्या नव-याला, जो सी. आर. पी. एफ. मधून सुट्टीवर घरी आला होता, त्याला वाटाड्या म्हणून जबरदस्तीने सोबत घेऊन गेले आहेत. पथक त्या दिशेने चालू लागले. काही अंतर जाताच समोरच्या एका उतारावरून एक व्यक्ती आणि तिच्यासोबत एक लहान मुलगी खाली उतरताना दिसली. साहेबांनी त्या व्यक्तीला ती दहा माणसं पाहिली का? असे विचारताच त्या व्यक्तीने काहीही सांगितले नाही.. पण त्या लहानग्या मुलीने मात्र लगेच सांगितले… आणि दिशाही दाखवली! ती व्यक्ती म्हणजे त्या भागात राहणारे एक शासकीय सेवेत असलेले शिक्षक होते!

आता पुढे जाऊन शोध घेण्यात फार अर्थ नव्हता, म्हणून हे पथक विश्रांतीसाठी थांबले. सोबतच्या वरिष्ठ अधिका-याने त्यांच्या त्या भागातल्या इतर पथकांना ही खबर दिली. त्यानुसार त्या वरच्या भागात ठिकठिकाणी शोध पथके रवाना करण्यात आली. ईश्वर सिंग यांना काही गप्प बसवेना. ते म्हणाले… आता इथवर आलोच आहे आणि आर. ओ. पी. चे कामही करायचेच होते तर इथून पुढे ते काम करून येतो. दहा जवान होते.. त्यांतील पाच जण त्या जागी विविध ठिकाणी पेरून बसवले आणि इतरांसोबत रोड ओपनिंग चे काम करावे असे ठरले. रात्र झाली… उजाडले… सोबत आणलेल्या पुरी-भाजी खाऊन जवान ताजेतवाने झाले!

– क्रमशः भाग पहिला 

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ हे भारतातच घडू शकतं… – लेखिका : मृदुला बेळे ☆ प्रस्तुती – डाॅ.भारती माटे ☆

डाॅ.भारती माटे

? इंद्रधनुष्य ?

☆ हे भारतातच घडू शकतं… – लेखिका : मृदुला बेळे ☆ प्रस्तुती – डाॅ.भारती माटे

मी इटलीमधल्या तुरीन इथे बौद्धिक संपदा कायद्यात एलएलएम करत होते, तेंव्हाची गोष्ट आहे, 2013 सालामधली. दिवसवसभराच्या लेक्चर्सने डोकं आंबून गेलं होतं, तेंव्हा एलिझा- आमची प्रोग्राम डिरेक्टर -वर्गात आली. ” माझ्याकडे इथं होणाऱ्या चित्रपट महोत्सवाचे काही फ्री पासेस आहेत, कुणाकुणाला यायचंय बोला पटकन”, ती म्हणाली. मी अज्जिबात वेळ न दवडता हात वर केला, आणि दुसऱ्या दिवशी संध्याकाळी एलिझा आणि आम्ही चार पाच जण या चित्रपट महोत्सवाला निघालो. जाऊन पोचलो तर समजलं की तिथं आज जे चित्रपट दाखवले जाणार होते त्यात एक भारतीय चित्रपट होता. डायलन मोहन ग्रे या दिग्दर्शकाचा ‘फायर इन द ब्लड’ या नावाचा.

हा चित्रपट पाहून बाहेर पडले तेंव्हा मी आंतरबाह्य हादरलेले होते. या हादरण्याच्या आड दडलेलं होतं एक कौतुक आणि एक शरम. जगात केवळ औषधं परवडत नसल्याने झालेल्या करोडो गरीब आफ्रिकी लोकांच्या मृत्यूने मी हादरून गेले होते. त्यांच्या मदतीला धावून गेलेल्या सिप्ला या भारतीय कंपनीच्या डोंगराएवढ्या कामाबद्दल एक भारतीय असूनही, आणि औषधनिर्माणशास्त्राची प्राध्यापिका असूनही मला काडीचीही माहिती नव्हती, याची मला प्रचंड लाज वाटली होती. पण त्याचवेळी कौतुक आणि आदराने मन भरून आलं होतं. हा आदर होता गरीब लोकांना स्वस्त दरात औषधं मिळावीत म्हणून सतत धडपडत आलेल्या, त्यासाठी योग्य धोरण, कायदे ठरवत आलेल्या भारत सरकारच्या दूरदर्शी धोरणाबद्दल, त्या दृष्टीने सतत प्रयत्नशील राह्यलेल्या भारतीय जनरिक औषध उद्योगाबद्दल, आणि त्यातल्या सिप्ला, डॉ. रेड्डीज, रॅनबॅक्सी या सारख्या औषध कंपन्यांबाबत.

त्या दिवशी महोत्सवाहून परत आले ती या विषायाचं भूत मानगुटीवर बसवून घेऊन. याबद्दल खोलात जाऊन वाचल्याशिवाय आणि माहिती करून घेतल्याशिवाय माझ्या जीवाला आता चैन पडणार नव्हती. सुदैवाने वाचण्यासारखं भरपूर काही उपलब्ध होतं. मुळात औषधनिर्माण आणि पेटंट हे दोन्ही माझ्या अभ्यासाचे विषय असल्याने वाचलेलं सगळं विनासायास समजत देखिल होतं. एक दिवस अचानक असं वाटायला लागलं की, ” अरे आपल्या देशातल्या वाईट गोष्टींना नावं ठेवण्यात आपण सगळे किती हिरिरीने पुढाकार घेतो. आपल्या देशातला भ्रष्टाचार, इथली रहदारी, अस्वच्छता, गरिबी याबद्दल आपण किती सतत तक्रार करतो, टीका करतो. मग आपल्या देशाने जगासाठी केलेल्या चांगल्या गोष्टीचा धिंडोराही आपण त्याच उत्साहाने पिटायला हवा, नाही का? त्यात आपण मागे का? कुणी तरी करायलाच हवं हे काम”. हा विचार डोक्याच्या एका कप्प्यात सतत सतत फेर धरून नाचत होता.

दरम्यान मी तुरीनहून भारतात परत आले, माझ्या दिनक्रमात अडकले, तरी हा विषय पिच्छा सोडत नव्हता. ” कथा अकलेच्या कायद्याची” या बौद्धीक संपदेवरील माझ्या स्तंभाचं लोकसत्तेत लिखाण सुरू झालं. या स्तंभाला मिळालेला प्रतिसाद अत्यंत सुखावणारा तर होताच. एक दिवस ‘ फायर इन द ब्लड’ पाहून बसलेला धक्का, वाटलेली शरम आणि जाणवलेला अभिमान, सगळे जणू कट करून गोळा झाले, आणि माझ्याभोवती फेर धरून नाचत सांगू लागले, “तूच सांग की ही कहाणी जगाला- तूच लिही” आणि माझ्याही नकळत मी आफ्रिकेत ” औषध औषध” म्हणत प्राण सोडणाऱ्या लाखो करोडो आफ्रिकन माणसांना वचन देऊन बसले – ” हो मी लिहीन”.

आणि मग सुरू झाला एक वेडं करणारा प्रवास. मिळेल तिथून, मिळेल त्या स्वरूपात, मिळेल ते वाचायला सुरुवात झाली. एक दिवस सिप्लाचे सर्वेसर्वा युसुफ हमीद यांचा ईमेल अ‍ॅड्रेस कुठून तरी मिळाला. तो बरोबर आहे की नाही हे सुद्धा मला माहित नव्हतं. आणि ते मुळीच उत्तर देणार नाहीत हे माहित असूनही ” मला तुमच्या कामावर असं असं पुस्तक लिहायचंय” असं कळवणारा ईमेल मी त्यांना धाडून मोकळी झाले. दुसऱ्याच दिवशी त्यांचं उत्तर आलं. पुढच्याच महिन्यात ते लंडनहून भारतात येणार होते आणि तेंव्हा मला भेटायला ये असं त्यांनी मला कळवलं होतं. मी हे वाचून प्रचंड खूश झाले आणि जोमाने कामाला लागले. आणखीन झपाट्याने वाचू लागले.

दरम्यानच्या काळात ते मुंबईत आले. माझं दोन तीनदा त्यांच्याशी फोनवर बोलणं झालं. दिलेल्या वेळेला त्याना फोन करूनही ते जर उचलू शकले नाहीत तर ते आठवणीने परत फोन करत आणि ” येस्स माय डिअर गर्ल… टेल मी व्हॉट आय कॅन डू फॉर यू” असं प्रेमाने बोलायला लागून मला आश्चर्यचकीत करत असत.

शेवटी त्यांच्या भेटीचा दिवस ठरला. भेटीच्या वेळेच्या बरीच आधी पोचून मी मुंबई सेंट्रल स्टेशन वरून सिप्लाच्या जुन्या कार्यालयाकडे चालत निघाले तेंव्हा मनात प्रचंड उत्कंठा तर होतीच. पण मी प्रचंड बेचैन होते. डॉ युसुफ हमीद यांच्या सारखा केम्ब्रीज मधे शिकलेला ज्ञानवृद्ध, तपोवृद्ध माणूस… अब्जाधीश… सिप्ला या भल्या मोठ्ठ्या औषध कंपनीचा सर्वेसर्वा! तो माझ्यासारख्या एका किरकोळ प्राध्यापिकेला भेटायला तयार झाला होता. आणि मी त्यांच्याशी नीट बोलू शकेन का या विचाराने माझ्या तळहाताला घाम फुटला होता… पाय लटपटत होते… छाती धडधडत होती. एकदाची शेवटच्या मजल्यावरच्या त्यांच्या भव्य कार्यालयात जाऊन पोचले. त्यांच्या कार्यालयात होते ते स्वत: आणि एमके हमीद- त्यांचे बंधू. लालसर गोरापान रंग, पूर्ण चंदेरी झालेले केस, तीक्ष्ण नजर पण बोलण्यात अत्यंत मार्दव असलेले माझ्या आजोबांच्या वयाचे डॉ. युसुफ हमीद. त्यांच्या व्यक्तीमत्वाला एक वलय होतं… आणि त्यांच्यासमोर बसल्या बसल्या ते मला जाणवू लागलं. त्यानी मजेशीर बोलून माझी चिंता एकदम दूर पळवून लावली आणि मग आमच्या गप्पा सुरू झाल्या. मला हे का लिहावसं वाटतंय असं त्यानी आधी समजून घेतलं. मग मी किती पाण्यात आहे हे जोखण्यासाठी त्यानी मला माझं या विषयातलं ज्ञान तपासून पाहणारे काही प्रश्न विचारले. आणि मी बरोबर उत्तरं दिल्यावर मग मला म्हणाले, ” हं… आता विचार”. आणि मी त्यांची मुलाखत घेऊ लागले.

उत्तरं देताना प्रत्येक गोष्ट त्यांना अगदी लख्ख आठवत होती. किती तरी औषधांच्या रासायनिक संरचना ते समोरच्या वहीत झरझर काढत होते. मधनंच ” रोझी sssरोझीssss” अश्या मोठमोठ्याने हाका मारत आपल्या सेक्रेटरीला कुठला तरी शोधनिबंध, वृत्तपत्रातला एखादा लेख, एखादं पुस्तक आणायला लावत होते. जेवायची वेळ झाली. त्या दिवशी प्रत्यक्ष डॉ. युसुफ हमीद याच्या पंगतीला बसून जेवण्याचा मान माझ्या नशिबात होता. जेवणं आटपून कॉफी पीत पीत आमची मुलाखत परत सुरू झाली. त्या दिवशी संपली नाही म्हणून दुसऱ्या दिवशीही चालू राह्यली. बोलण्याच्या ओघात मी ज्या लोकांशी बोलायला हवं अश्या किती तरी लोकांची नावं ते मला सांगत होते आणि मी लिहून घेत होते. मुलाखत संपवून मी नाशिकला परत आले तेंव्हा मी खरोखर थक्क झाले होते. डॉ. हमीद यांच्या ज्ञानी, मृदू हुशार व्यक्तीमत्वाने दीपून गेले होते.

दोनच दिवसात त्यांच्याकडून एक खोकं भरून पुस्तकं, सीडीज, वृत्तपत्रीय लेख माझ्या घरी येऊन पोचले. त्यानंतर त्यानी सांगितलेल्या या लढ्यातल्या शिलेदारांना शोधून काढून त्यांच्याशी संपर्क करण्याचा माझा उद्योग सुरू झाला. ही मंडळी जगभर पसरलेली होती.

मी राजहंसच्या दि. ग. माजगावकरांना पुस्तकाची कल्पना कानावर घातली आणि त्यांनीही पुस्तक करायला आनंदाने होकार दिला. देशोदेशी पसरलेल्या माझ्या कहाणीच्या नायकांचा शोध घेण्यात गुंतून गेले.

विशेष उल्लेख करीन तो न्यू यॉर्क टाइम्स वृत्तपत्रात आरोग्य विषयक लिखाण करणारे पत्रकार डोनाल्ड मॅकनील यांचा. डोनाल्डने मला आतोनात मदत केली. डॉ. हमीद यांचं काम सगळ्यात आधी जगाच्या नकाशावर जाहीरपणे आणलं ते डोनाल्डने- न्यू यॉर्क टाईम्समधे याबाबत लेख लिहून. मी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं द्यायला डोनाल्डने मला मोठमोठे ईमेल्स लिहिले, दुसऱ्याना फोनवर दिलेल्या मुलाखती मला पाठवल्या, स्वत: लिहिलेलं काही लिखाण पाठवलं… आणि इतर किमान पन्नास लोकांशी माझ्या ओळखी करून दिल्या. या सगळ्यांची मी आजन्म ऋणी राहीन.

तुरीनला असताना जी कहाणी ऐकून मी प्रचंड अस्वस्थ झाले होते, हलले होते, ती कहाणी या सगळ्या मंडळींबरोबर जणू पुन्हा एकदा जगले. त्या कहाणीचा एक भाग झाले. या सगळ्यांशी बोलताना, या बद्दल लिहिताना अनेकदा फार भावनिक व्हायला झालं. ही कहाणी लिहिताना औषधनिर्माणशास्त्राची एक प्राध्यापक आणि आजन्म विद्यार्थिनी म्हणून माझी सामाजिक बांधिलकी काय आहे याची लख्ख जाणीव मला झाली. ती जाणीव माझ्या विद्यार्थ्यांमधे यावी म्हणून मी फार विचारपूर्वक प्रयत्न करू लागले.

या विषयातली सगळी तांत्रिक माहिती लिहायची, पण ती सामान्य माणसाला समजली पाहिजे, त्यासाठी ती कादंबरीसारख्या फॉर्ममधे कशी लिहिता येईल, हे एक मोठंच आव्हान होतं.

सामान्य माणूस महाग औषधं घेत राहतो आणि पिळवटला जातो. हे थांबवण्यासाठी भारतीय पेटंट कायद्यात फार उत्तम सुविधा आहेत. त्यावर जगभरातून, विशेषतः अमेरिका आणि युरोपातून प्रचंड टिका होते, भारतावर प्रचंड दबाव आणला जातो. पण आपलं सरकार बधत नाही. आमच्या जनतेचं आरोग्य तुमच्या पेटंटसपेक्षा जास्त महत्वाचं आहे हे ठणकावून सांगत राहते. रेडक्रॉस, डॉक्टर्स विदाउट बॉर्डर्स सारख्या सेवाभावी संस्थांना गरीब देशात काम करण्यासाठी morning स्वस्त पण उत्तम दर्जाची औषधं भारत पुरवत राहतो. पण त्याचबरोबर अमेरिका आणि युरोपसारख्या दर्जाबाबत अत्यंत जागरूक असणाऱ्या देशांचाही सगळ्यात मोठा निर्यातदार बनतो. भारत हे कसं करू धजावतो हे जाणून घेण्यात इतर देशातल्या लोकांना प्रचंड रस असतो. आर्जेन्टिना, इंडोनेशियातले लोक जेंव्हा येऊन सांगतात की “सामान्य नागरिकांना औषधं स्वस्तात मिळावी म्हणून काय करायचं हे भारताने आम्हाला शिकवलंय आणि तुम्ही दाखवलेल्या रस्त्यावर आम्ही चालतोय”, तेंव्हा ऊर अभिमानाने भरून येतो.

सगळ्या जगाची फार्मसी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारताच्या औषधनिर्माण उद्योगाचा आपण एक लहान बिंदू इतका छोटा भाग आहोत या विचाराने फार कृतार्थ वाटतं! आणि म्हणूनच हे ऋण फेडण्यासाठी माझ्यासारख्या या बिंदूने केलेला एक छोटासा प्रयत्न, उचललेला एक खारीचा वाटा, म्हणजे #अशीही_एक_झुंज हे पुस्तक आहे. भारताबद्दल अभिमान वाटण्याचे आणखी एक कारण हे पुस्तक वाचकांना नक्की देईल याची मला नुसती आशा नव्हे तर खात्री वाटते!

लेखिका : मृदुला बेळे

प्रस्तुती : डॉ. भारती माटे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares