मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “सेवामूर्ती ठक्कर बाप्पा…” ☆ सौ शोभा जोशी ☆

सौ शोभा जोशी 

? इंद्रधनुष्य ?

☆ “सेवामूर्ती ठक्कर बाप्पा…” ☆ सौ शोभा जोशी

ठक्कर बाप्पा ज्यांनी आपले जीवनदलित आणि जनजातींच्या सेवेत खर्ची घातले त्यांच्याबद्दल स्व. डाॅ. राजेंद्र प्रसाद म्हणाले होते की, “जेव्हा जेव्हा निःस्वार्थ समाजसेवकांची आठवण येईल तेव्हा तेव्हा ठक्कर बाप्पांची मूर्तीच डोळ्यांसमोर उभी राहिल. “

ठक्कर बाप्पांचा जन्म गुजरात मधील भावनगर मध्ये २९ नोव्हेंबर १८६९ मध्ये झाला होता. त्यांचे मूळ नाव अमृतलाल ठक्कर होते. त्यांचे वडिल विठ्ठलदास लालजी ठक्कर यांची आर्थिक परिस्थिती सर्वसाधारण होती तरी समाजातील सर्व मुलांच्या शिक्षणाकडे त्यांचे विशेष लक्ष होते. आणि वडिलांमधील हीच सेवावृत्ती ठक्कर बाप्पांच्यात आली होती. त्यांनी शिष्यवृत्ती मिळवून पुण्यामधून इंजिनिअरींगची पदवी मिळवली होती.

त्यावेळी जातीभेदाचे भयंकर भूत समाजाच्या मानगुटी बसले होते त्यामुळे ठक्कर बाप्पा व्यथित झाले होते.

शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी सोलापूर आणि भावनगर येथे रेल्वेत नोकरी केली पण इतर अधिकार्‍यांच्या प्रमाणे त्यांनी लाच घेणे नाकारले म्हणून त्यांना नोकरीवर पाणी सोडावे लागले.

त्यानंतर त्यांनी वढवण, पोरबंदर राज्यात काम केले. आफ्रीकेमध्ये तसेच सांगलीमध्ये सुध्दा काही काळ काम केले. मुंबई नगरपालिकेत संपूर्ण शहराचा कचरा गोळा करणार्‍या रेल्वेत काम केले. त्यावेळी कचरा गोळा करणार्‍या हरिजन कामगारांना वरिष्ठांना लाच द्यावी लागत होती. त्यांच्याविषयी त्यांच्या मनात आस्था निर्माण झाली आणि त्यांनी याविरूध्द आवाज उठवला. २३ वर्षं त्यांनी ही नोकरी केली.

त्यांनी लोकांमध्ये स्वाभिमान जागवण्याचे काम केले तसेच खादीचाही प्रचार केला. गुजरात मध्ये झालोद -दा होच या वनवासी क्षेत्रातील भील लोकांसाठी ‘ भील सेवा मंडळा’ची स्थापना करून त्यांना शिक्षण देण्याचे काम सुरू केले ते आजही सुरू आहे.

मध्य प्रदेशात जनजातींचे धर्मांतरण करण्याचे, ख्रिश्र्चनांचे काम खूप मोठ्या प्रमाणात सुरू होते. त्याला आळा घालण्यासाठी त्यावेळचे मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री रवी शंकर शुक्ल यांना ठक्कर बाप्पांनी सल्ला दिला की, लोकांमध्ये देशप्रेम जागृत करण्यासाठी सरकारने एक स्वतंत्र विभाग सुरू करावा. त्यांच्या मार्गदर्शनानुसार सरकारने ‘ जनजाती कल्याण विभाग ‘ सुरू केला. हे काम व्यवस्थित चालावे यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते बाळासाहेब देशपांडे यांना नागपूरहून बोलावून घेतले. त्यांच्याकडे हे काम सोपवले गेले. बाळासाहेबांनी, जनजातीच्या विद्यार्थ्यांसाठी एक वर्षात १०० शाळा सुरू करण्याची योजना आखली. ठक्कर बाप्पांना हे अशक्य वाटत होते. त्यांनी बाळासाहेबांना सांगितले ही योजना सफल झाली तर मी स्वतः या शाळांना भेटी देईन. या शाळा प्रत्यक्षात सुरू झाल्यावर त्यांनी वृध्दावस्थेतही या शाळांना भेटी देऊन बाळासाहेबांचे कौतुक केले आणि त्यांना २५०/- रू. बक्षिस दिले. त्या काळात २५०/- रू. ही छोटी रक्कम नव्हती.

वनवासी कल्याण आश्रमाच्या स्थापनेमागे गोळवलकर गुरूंजीप्रमाणेच ठक्कर बाप्पांचीही प्रेरणा होती.

भारतातील एखादाच प्रांत असा असेल जिथे त्यांनी सेवाकार्य केले नाही.

देशाच्या स्वातंत्र्यानंतर ते संसदेचे सदस्य झाले. या पदाचा उपयोग सुध्दा त्यांनी दलित आणि जनजातींच्या सेवेसाठीच केला आणि अमृत ठक्कर सर्वांचे ठक्कर बाप्पा झाले.

‘जीवन त्यांना कळले हो।मी पण ज्यांचे पक्वफळापरी सहजपणाने गळले हो।।

जळापरी मन निर्मळ ज्यांचे गेले तेथे मिळाले हो।चराचराचे होऊनी जीवन स्नेहासम पाजळले हो।। ‘

कवी बा. भ. बोरकरांच्या या ओळी ठक्कर बाप्पांना तंतोतंत लागू पडतात.

२० जानेवारी १९५१ रोजी ठक्कर बाप्पांना देवाज्ञा झाली. जीवनभर सेवाकार्य करणार्‍या या सेवाव्रतीला त्यांच्या स्मृतीदिनी भावपूर्ण श्रध्दांजली.

©  सौ शोभा जोशी.

कार्यकर्ती, जनजाती कल्याण आश्रम, पुणे महानगर. 

मो ९४२२३१९९६२ 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ अध्यात्म आणि विस्मरण झालेल्या लोकांचे काळजीवाहू पाल्य – भाग २ – लेखिका : डॉ. पुष्पा घळसासी ☆ प्रस्तुती – सौ. शुभदा भा. कुलकर्णी (विभावरी) ☆

सौ. शुभदा भास्कर कुलकर्णी (विभावरी)

 

? इंद्रधनुष्य ?

☆ अध्यात्म आणि विस्मरण झालेल्या लोकांचे काळजीवाहू पाल्य – भाग २ – लेखिका : डॉ. पुष्पा घळसासी ☆ प्रस्तुती – सौ. शुभदा भा. कुलकर्णी (विभावरी) 

 (माणसाला आपला घरात अजूनही उपयोग होतो आहे ही भावना सुखावह असते.) – 

इथून पुढे – – 

त्यांच्याबरोबर पत्ते खेळावे. फार वेळ खेळावे लागत नाही. कारण अशा माणसांना पेशंस खूप कमी असतो. ते एकच गोष्ट करण्यास लगेच कंटाळतात. पत्त्यांमध्येही आधी क्रमवार चित्र लावून घ्यावीत. म्हणजे राजा राणी गुलाम l यांचा क्रम जो आहे तो आपण आधी त्यांच्यापुढे काढून दाखवावा आणि सतत त्यांच्याकडून करून घ्यावा. असे केल्याने तो सिक्वेन्स जो आहे तो लक्षात येईल. त्यांच्यासमोर बसून आपणही पत्त्यातली चित्र क्रमवार सतत लावावीत. त्यामुळे ती चित्रे डोळ्यात बसतील.

त्यानंतर अगदी लहान लहान सिक्वेन्स करायला भाग पाडावी. आठ दहा दिवस एवढेच घ्यावे. फार घेऊ नये. त्यानंतर मोठे सिक्वेन्स लावणे. म्हणजे प्रथम १२३४हे पहिले आठ दहा दिवस करायचं. आणि नंतर एक ते दहा अंक नंतरच्या आठवड्यात करावे. असे मोठे सिक्वेन्स लावण एक एक पायरी चढायला शिकवण. नंतर लहान मुलांची खेळतो ते भिकार सावकार किंवा एकच रंगाचे पत्ते वेगळे करणे, एकाच आकारचे पत्ते वेगळे करणे, जेणेकरून त्यांना बदाम, इस्पिक, चौकट, किलवर हे पत्ते वेगवेगळे ओळखता येऊ लागतील. रंग समजतील.

काही तोंडी गणिती खेळ घेणे म्हणजे एक ते दहा अंक. एक ते वीस, तीस ते चाळीस असे वाढवत रोज म्हणायचे. हे जमायला लागल्यावर दोन ते पाच पर्यंतचे पाढे घ्यायचे. विशिष्ट अंक काढून एक ते 20 अंक मोजायला शिकवायचं. उदाहरणार्थ तीन अंक गाळला म्हणून एक दोन चार पाच सात आठ दहा अकरा. यात खरं म्हणजे सहा आणि नऊ हे सुद्धा अंक येतात पण त्या सहा आणि नऊ हे अंक तीन गुणिले दोन आणि तीन गुणिले तीन हे कदाचित त्यांच्या लक्षात येणार नाही म्हणून इथे तो वापरू नये. भाषिक खेळ, शब्दकोडी सोडवणे, अंताक्षरी घेणे, गावाच्या भेंड्या लावणे यावरून स्मरणशक्ती वाढते. अर्थात आपल्या मुलांबरोबरही लहानपणी हे खेळ खेळले तर त्यांची स्मरणशक्ती वाढते हे प्रयोगाने सिद्ध झालेले आहे. त्यांच्याबरोबर कविता म्हणणे असे अनेक विविध खेळ आपण घेऊ शकतो. शब्दांमधील अक्षरांची उलटा पालट करून योग्य ते शब्द म्हणजे अर्थपूर्ण शब्द तयार करणे. पहिला आणि शेवटचा अक्षर एकच असलं शब्द कसा उलटा सुलता वाचला तरी तोच होतो. अशा प्रकारचे खेळ. म्हणजे उदाहरणार्थ समास, नवीन कसाही वाचला तरी तो तोच शब्द राहील. असे छोटे छोटे खेळ खेळतात त्यांच्या चांगला फायदा होतो 

ओंकार आणि गायत्री मंत्राने मेंदूच्या पेशी उद्दीपित होतात त्यांना काही प्रमाणात तरी आठवण्यासाठी हा पण एक प्रयत्न करता येतो. तसंच श्वास जो आहे तो श्वास मोजून वाढवून आणि सोडून. या प्रकारची क्रिया केली म्हणजे मोठ्या माणसांमध्ये आपण पाच, सात, पाच असं करतो. म्हणजे पाच सेकंद श्वास घेणे, सात सेकंद तो साठवणे छातीमध्ये आणि पुढचे पाच सेकंद उछवास करणे. याला आपण मोठी माणसं सहज करू शकतो. पण या वयाला आणि त्यांच्या स्थितीला हे शक्य होत नाही म्हणून श्वास घेण्याची क्रिया 3 सेकंद, श्वास रोखण्याची क्रिया 3 सेकंद, आणि श्वास सोडण्याची क्रिया तीन सेकंद याप्रमाणे करून घ्यावे त्याचा चांगला उपयोग होतो. त्यांच्याबरोबर आपण फिरायला जाऊ शकता. मग फिरायला कुठे लांब जायचं असं नाही. पार्किंग मध्ये, जवळच्या बागेत थोडावेळ त्यांना फिरवून आणले. त्यांच्या मित्रांना, आपल्या मित्रांना मुद्दाम त्यांच्याशी गप्पा मारायला बोलावणे. म्हणजे त्यांनाही सोशल लाइफ अनुभवता येते. तसंच आपल्या मुलांच्या मित्रांना घरी बोलवावं त्या मित्रांना पूर्ण कल्पना त्यांच्या आजाराची पूर्ण कल्पना द्यावी आणि ती मुलं जर त्या आजोबांना घेऊन किंवा आजीला घेऊन काही खेळ खेळले तर ते त्या वेळापुरते आनंदी राहतात कारण त्यांनाही नातवंडांची आवड असते. आणि मग तीही मुलं एक अर्धा तास रोज खेळली तरी त्या वेळेची ते वाट बघतात. कदाचित त्यांना वेळ समजणार नाही. किती वाजलेत ते पण कळणार नाही. पण मुले घरी येऊन बसली आहेत हे मेंदूला त्यांची तेवढी तरी जाणीव होईल. अशी आशा वाटते.

आता प्रश्न असा येतो की पेशंट समजा व्हायलेंट झाला तर पेशंटला शांत कसं करायचं? आपल्या मनावरील नियंत्रण, योगाचा उपयोग समजूत घालण्यासाठी लागणारा आपला पेशंस, आणि सहानुभूती, समजूतदारपणा या गोष्टी जर आपण आपल्या अंगी baanaavalya, वाढवल्या तर हे शक्य होईल. म्हणजे इथे पुन्हा अध्यात्म आलं. हे अध्यात्माच्या साह्याने आपण आपल्यामध्ये तयार केलं तर त्यांच्या मनाप्रमाणे त्यावेळी गोष्टी करता येतील. ते लगेच विसरणार. पण पेशंट व्हायोलंत झाल्यास मग अवघड जातं. आपल्या मुलांवरही नियंत्रण ठेवायला हवे. मुलांना त्यांची मानसिक स्थिती आपण स्वतः शांतपणे समजावून सांगावी. पेशंटकडे दुर्लक्ष होऊ देऊ नये. आजोबा आजीशी पूर्वीप्रमाणेच प्रेमाचे वागणे ठेवण्यास सांगावे. त्यांच्याशी गोड बोलायला सांगा. वर्गातील गमती जमती त्यांना सांगाव्यात. जेणेकरून त्यांना घरात महत्त्व मिळत आहे हे त्यावेलेपुरते तरी समजते व त्यांची चिडचिड कमी होते. असं पहा “परिस्थिती बदलता येत नसेल तर आपली मन:स्थिती बदलावी लागते” 

याबरोबरच त्यांची औषधा वेळेवर द्यायला हवी. त्यांच्या जवळच्या खिशात किंवा पर्समध्ये किंवा आपण जो फ्रेंडशिप बँड बांधतो त्या बँडवर त्यांचं नाव, आपला नंबर मोबाईल नंबर, आणि घरचा पत्ता हा त्यांच्याजवळ सतत ठेवावा. जेणेकरून ते एकटेच जर बाहेर पडले आणि हरवले, रस्ता सापडत नसेल तर कोणीतरी माणूस तो त्यांना पत्ता सांगून घरापर्यंत आणून सोडेल. त्यांचा आजार यांची माहिती पण त्यात द्यायला विसरू नये. इथे परिस्थिती बदलता येत नाही म्हणून आपल्यावरच बंधने येतात. म्हणून आपण स्थित:प्रज्ञ राहणं हेच अध्यात्म आहे. ज्याची आपल्यावर जबाबदारी आहे तो एखाद्या लहान मुलासारखा होतो. म्हणून त्यांचे हट्ट पुरवावे लागतात. पण ते सर्व क्षणिक आहेत. दुसऱ्या मिनिटाला ते सर्व विसरतात. म्हणून स्वतःच्या रागावर नियंत्रण ठेवायला हवे. कारण तुम्ही करताय त्या सेवेची कदाचित त्यांना जाणीव होणार नाही, पण त्यांच्या आत्म्याचे आशीर्वाद आपल्याला मिळतात ते महत्त्वाचे आहेत, माझी आजी म्हणायची की “कोणी एखाद्या माणसाने आपल्याला बोलून काही आशीर्वाद दिले नाहीत तरी त्याच्या आत्म्याचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतात”. बोलीभाषा मन शांत करण्यासाठी, (स्वतःचे आणि पेशंटचे सुद्धा)

त्यांची चित्तवृत्ती जागृत करण्यासाठी सावकाश पण लयबद्ध स्वरात. आवाजातील चढ-उतार ऐकून मानसिक तृप्ती करणारी. त्याच वेळी चेहऱ्यावरील भाव महत्त्वाचे आहेत. त्यांना आनंददायी वाटले पाहिजे आणि इतर लोक काय करतील, म्हणतील याची परवा न करता स्वतः वागायचे आणि आपल्या मुलांना सुद्धा तशीच शिकवण द्यायची आहे.

आता प्रश्न असा की अध्यात्म कुठे आलं? आपण सुरुवातीलाच अध्यात्माचा अर्थ समजून घेतलाय. स्वतःला ओळखणे मी कसा आहे याचे उत्तर शोधताना आपल्याला आजूबाजूच्या सर्वांनी चांगला माणूस म्हणून ओळखावे अशी सर्वांची सूpt इच्छा असते. त्यासाठी आत्मशोध घ्यावा लागतो. “उधारेत आत्मन्:आत्मनं “आपणच आपला फक्त उद्धार करायचा नाही तर एक कुटुंब वचन म्हणून” मी “हे याचे उत्तर शोधायचे. मी मुलगा, मुलगी, भाऊ-बहीण, बहिणीनं मुले, नातेवाईक यांच्याशी जोडला गेलेलो आहे. आपणच आपला उद्धार करायचा असेल तर कुटुंबातील सर्व नाती मला समजूतदारपणे गोडीने शांततेने आपलीशी करावी लागतील. आई बाबा पण त्यातच असतील. सर्वांना सुखी, आनंदी ठेवायचे असेल तर आपल्या अंगी अध्यात्म रुजवण्याशिवाय पर्याय नाही. सर्वेशु sukhina संतु lसर्वे संतू निरामय:llअसं आपल्याकडे म्हणलं जातं. सगळ्यांना सुखी करायचे सगळ्यांनाच निरामय आयुष्य द्यायचे ही आपली सुप्त इच्छा मनापासूनची इच्छा आहे. अशा आई-वडिलांचे संगोपन मनापासून करायचे म्हणजे सुद्धा ती एक ईश्वरी सेवा आहे.. मग अध्यात्म त्यापासून काय वेगळे आहे हो?

प्रस्तुती : शुभदा भा. कुलकर्णी — भाग दुसरा  

💦🌨️

लेखिका : डॉ. सौ. पुष्पा घळसासी

प्रस्तुती : शुभदा भा.कुलकर्णी (विभावरी)

कोथरूड -पुणे.३८.

   मो.९५९५५५७९०८ 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ‘रथसप्तमी…’ ☆ श्री दिवाकर बुरसे ☆

श्री दिवाकर बुरसे

? इंद्रधनुष्य ?

☆ ‘रथसप्तमी…’ ☆ श्री दिवाकर बुरसे

कथांनी, प्रथांनी उजळलेला सूर्यरथ

 *प्रास्ताविक*

 माघ मास शुक्ल सप्तमी म्हणजे रथसप्तमी. पहाट अजून झोपेत असते. आकाशाच्या पदरावरून अंधार हळूहळू सरकतो आणि पूर्व क्षितिजावर सोनसळी रेष उमटते. त्या क्षणी काळाचा रथ पुढे सरकतो, सप्त घोड्यांच्या टापांनी अवकाश गाजते. ऋषींची वाणी आठवते—

तमसो मा ज्योतिर्गमय।”

अंधारातून प्रकाशाकडे नेणारा हा प्रवास म्हणजेच रथसप्तमी. या सप्तमीला अचला सप्तमी, आरोग्य सप्तमी, अर्क सप्तमी, माघी सप्तमी अशीही अन्य नावे आहेत.

या पहाटे अनेक घरांच्या दाराशी रांगोळी उमटते. ती केवळ सजावट नसते, तर ऋतू परिवर्तनाची जाणीव करून देणारी शुभ खूण असते. तांदळाच्या पिठाने काढलेली रांगोळी घरात समृद्धीचे, अन्नधान्याचे आणि पवित्रतेचे प्रतीक ठरते. घराच्या उंबरठ्यावरच सण उतरतो—जणू सूर्याला आमंत्रण दिले जाते.

हा सण केवळ एक तिथी नाही, तर कथा, श्रद्धा, विज्ञान आणि अनुभवांनी विणलेला एक संस्कार आहे. सूर्याभोवती गुंफलेल्या असंख्य पौराणिक कथा, ऐतिहासिक परंपरा आणि लोकविश्वास या दिवशी एकत्र येतात आणि मानवी जीवनाला उजाळा देतात.

*पौराणिक कथा*

सूर्यदेवांचा जन्म आणि सप्त घोड्यांचे रहस्य

 पुराणकथांनुसार रथसप्तमी हा सूर्यदेवांचा जन्मदिन मानला जातो. कश्यप ऋषी आणि अदिती यांचा पुत्र म्हणून सूर्याचा जन्म झाला, म्हणून त्याला आदित्य म्हटले जाते. अदिती ही देवमाता, तर सूर्य हा देवतांचा तेजस्वी अधिपती—ही कल्पना वैदिक परंपरेत खोलवर रुजलेली आहे.

 सूर्याच्या रथाला सप्त घोडे आहेत, अशी कथा प्रसिद्ध आहे. हे घोडे म्हणजे सात दिवस, सात किरण, सात रंग आणि सात चेतना. मार्कंडेय पुराणात सूर्याचा सारथी अरुण असल्याचा उल्लेख आहे—जो उषेचे, म्हणजे पहाटेच्या प्रकाशाचे प्रतीक आहे. त्यामुळे रथसप्तमीची पहाट विशेष पवित्र मानली जाते.

लोककथेत सांगतात—

“अरुण आला की सूर्य मागेच येतो.”

म्हणजेच आशा आधी येते, पूर्ण प्रकाश नंतर.

*यशोधरा आणि यशाचा सूर्य*

एक भावस्पर्शी कथा

एक पौराणिक कथा सांगते की यशोधरा नावाची स्त्री दीर्घकाळ आजाराने त्रस्त होती. ऋषींनी तिला रथसप्तमीच्या दिवशी सूर्योदयाला स्नान करून सूर्योपासना करण्यास सांगितले. श्रद्धेने केलेल्या उपासनेमुळे तिचे आरोग्य सुधारले आणि तिला आयुष्यात नवा प्रकाश मिळाला. त्यामुळे काही प्रांतांत रथसप्तमीला आरोग्यसप्तमी असेही म्हणतात. याच आरोग्यदृष्टीतून अनेक घरांत दाराबाहेर गोमयाच्या गोवऱ्या पेटवून त्यावर मातीच्या बोळक्यात दूध व तांदूळ शिजवले जातात. गोमयाचा अग्नी वातावरण शुद्ध करतो, तर मातीचे भांडे उष्णता समतोलपणे धरून ठेवते. दूध आणि तांदूळ हे पोषणाचे प्रतीक—बदलत्या ऋतूत शरीराला बळ देणारे.

दक्षिण भारतात दूध उतू जाऊन अग्नीवर सांडणे, ही प्रथा विशेष अर्थवाही मानली जाते. दूध उतू जाणे म्हणजे जीवनातली समृद्धी ओसंडून वाहो, अन्न आणि आरोग्य भरपूर सो—अशी सामूहिक इच्छा.

सूर्यपूजा म्हणजे केवळ देवपूजा नाही, तर आरोग्याची जपणूक आहे, हेच या प्रथेतून व्यक्त होते. म्हणूनच मंत्र म्हटला जातो—

“नमः सूर्याय शान्ताय सर्वरोगनिवारणाय।”

*रामायण–महाभारतातील सूर्यसंदर्भ*

रामायणात भगवान राम सूर्यवंशी असल्याचे सांगितले जाते. युद्धाच्या निर्णायक क्षणी ऋषी अगस्त्य रामाला आदित्यहृदय स्तोत्र देतात—

“एष देवो महातेजा आदित्यः पापनाशनः”

हे स्तोत्र केवळ भक्तीगीत नसून आत्मविश्वास जागवणारे तेजस्वी वचन आहे.

सूर्य हा बाह्य अंधार जसा दूर करतो, तसाच अंतर्मनातील भयही नाहीसे करतो—ही रामायणातील शिकवण आहे.

महाभारतात कर्ण हा सूर्यपुत्र म्हणून ओळखला जातो. कुंतीने केलेल्या सूर्योपासनेतून कर्णाचा जन्म झाला. सूर्याने कर्णाला कवच-कुंडले दिली—ती म्हणजे आत्मसन्मान, दानशूरता आणि तेजस्वी व्यक्तिमत्त्वाचे प्रतीक. त्यामुळे सूर्य हा केवळ शक्तीचा नाही, तर धर्मनिष्ठेचा स्रोतही मानला जातो.

*खगोलीय सत्य आणि ऋषींची दूरदृष्टी*

रथसप्तमीचा खगोलीय अर्थ अत्यंत महत्त्वाचा आहे. मकरसंक्रांतीनंतर सूर्य उत्तरायणात स्थिरावतो आणि रथसप्तमीच्या आसपास त्याची उष्णता स्पष्टपणे वाढू लागते. दिवस मोठे होतात, जीवन पुन्हा गतिमान होते. ऋषींनी हे निरीक्षण हजारो वर्षांपूर्वी केले आणि त्याला सणाचे रूप दिले. म्हणूनच म्हणतात—

“भारतीय सण हे ऋतूंचे शास्त्र आहे. ”

सूर्याचा रथ म्हणजे कालचक्र. तो थांबत नाही, थकत नाही. सिंधू संस्कृतीपासून वैदिक काळापर्यंत सूर्यपूजा अखंड सुरू आहे. कोणार्क व मोढेराची मंदिरे—ठरावीक दिवशी गर्भगृहात प्रवेश करणारे सूर्यकिरण—विज्ञान आणि श्रद्धेचे अद्भुत मिलन दाखवतात.

*कृषी कथा : शेतकऱ्याचा देव*

लोककथांमध्ये सांगतात—एकदा सूर्य अनेक दिवस ढगाआड लपला. शेतकरी चिंतेत पडले. पिके कोमेजू लागली. सर्व गावकऱ्यांनी एकत्र येऊन सूर्याची प्रार्थना केली. काही दिवसांत आकाश निर्मळ झाले आणि पीक वाचले. तेव्हापासून म्हणतात—

“सूर्य रुसला तर अन्न रुसतं.”

रथसप्तमी शेतकऱ्यासाठी आश्वासन घेऊन येते. थंडी कमी होते, पिकांना बळ येते. म्हणूनच या दिवशी शेतात पूजा, नवीन कामाची सुरुवात केली जाते. “अन्नं बहु कुर्वीत” ही वेदवाणी शिवारात साकार होते.

*विविध प्रांतांतील कथा आणि परंपरा*

तिरुपतीत रथसप्तमीला भगवान व्यंकटेश सर्व वाहनांवर नगरप्रदक्षिणा करतात—देव स्वतः भक्तांना भेटायला बाहेर पडतो, अशी श्रद्धा आहे.

ओडिशामध्ये चंद्रभागा नदीत स्नान केल्यास पापक्षालन होते, असे मानले जाते.

उत्तर भारतात सूर्याला अर्घ्य देताना म्हटले जाते— “हे सूर्यनारायणा, आम्हाला दीर्घायुष्य दे.” 

महाराष्ट्रात पहाटे स्त्रिया म्हणतात—

“सूर्य आला, सोनं आलं, घरात सुख समाधान आलं.”

*उपसंहार*

कथांमधील जीवनदृष्टी

रथसप्तमी हा कथांचा, किरणांचा आणि काळाचा संगम आहे. रांगोळीतील शुभ्र रेषा, गोमयाचा शुद्ध करणारा अग्नी, उतू जाणारे दूध—या साऱ्या प्रतीकांमधून एकच संदेश मिळतो—जीवन भरभरून जगावे.

आज विज्ञान प्रगत झाले असले, तरी सूर्यावरील आपले अवलंबित्व बदललेले नाही. म्हणूनच रथसप्तमी आजही तितकीच अर्थपूर्ण आहे.

“जिथे सूर्य आहे, तिथे जीवन आहे. ”

सप्त घोड्यांचा रथ अजूनही धावत आहे—आकाशात, शिवारात आणि आपल्या मनात. त्या रथाकडे पाहण्याची, त्याच्या प्रकाशात स्वतःला ओळखण्याची संधी म्हणजेच रथसप्तमी!

यावर्षी, २०२६ रविवार २५ जानेवारी दिवशी रथसप्तमी आहे.

*ॐ श्रीसवितासूर्यनारायणाय नमः ।।*

© श्री  दिवाकर बुरसे

१४ जानेवारी २०२६

पुणे

संपर्कः ९२८४३००१२५, ९५५२६२९२४५

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ अध्यात्म आणि विस्मरण झालेल्या लोकांचे काळजीवाहू पाल्य – भाग १ – लेखिका : डॉ. पुष्पा घळसासी ☆ प्रस्तुती – सौ. शुभदा भा. कुलकर्णी (विभावरी) ☆

सौ. शुभदा भास्कर कुलकर्णी (विभावरी)

 

? इंद्रधनुष्य ?

☆ अध्यात्म आणि विस्मरण झालेल्या लोकांचे काळजीवाहू पाल्य – भाग १ – लेखिका : डॉ. पुष्पा घळसासी ☆ प्रस्तुती – सौ. शुभदा भा. कुलकर्णी (विभावरी) 

हा विषय म्हणलं तर सोपा आहे म्हणलं तर फार कठीण. कारण अध्यात्म हा धार्मिक विषय नाही ती एक जीवनशैली सांगते. हिंदू हा सुद्धा धर्म नाही माणसांनी समाजात, निसर्गात, वातावरणात कसे वागावे म्हणजे आजच्या भाषेत आपली लाइफ स्टाईल कशी असावी हे सांगितले जाते. म्हणूनच कदाचित अध्यात्म हे हिंदू धर्मातील काही विशेष आहे असा गैरसमज समाजामध्ये रूढ झाला आहे. अध्यात्म हे कोणत्याही जाती, धर्माने अवलंबवlवे किंवा जोपासाव. त्यास भेदभाव नाही. मुळात अध्यात्म एका धर्माची, ज्ञातीची, समाजाची मक्तेदारी नाही. मग अध्यात्म म्हणजे आहे तरी काय? त्याचा विस्तार किती? आणि ते कोणते जीवनशैली माणसाला शिकवते? हा सहज प्रश्न पडतो.

अध्यात्म या शब्दाची फोड दोन प्रकारांनी करता येते.

१) आधी + आत्मा. म्हणजेच स्वतःच्या आत्म्याची ओळख आधी करून घेणे. आणि २)आद्य अधिक आत्मा. आद्य म्हणजे प्रथम. प्रथम आपण आपल्याला ओळखायला शिकले पाहिजे. (संदर्भ यूट्यूब)याचा अर्थ आधी स्वतःला ओळखा, आत्मशोध घ्या. मी कोण आहे म्हणजेच अर्थात मी ईश्वराचा अंश आहे. आपण एक माणूस म्हणून, ” मी” कसा आहे याचे उत्तर शोधा. ते उत्तर मिळाले की पुढे आपली आपल्याला सुधारणा करता येते. यातूनच आपण आपले आयुष्य नेमके कसे जगणार आहोत याची पूर्व रेषा मनामध्ये हळूहळू तयार होईल. त्यातूनच जीवन जगण्याचा उद्देश मनात ठसेल, लक्षात येईल. त्यामुळे भावभावनांबाबत स्थितप्रज्ञता येइल. निर्भय जीवन जगणे, आत्मसन्मानाने जगणे, लोकांप्रती नि:स्वार्थ सेवा आणि प्रेम, बंधुभाव तयार होऊन जीवनात सकारात्मक दृष्टी प्राप्त करून घेणे त्यातून आनंद मिळवणे आणि नैतिक मूल्यांचे पालन करणे हे फक्त माणसातील व्यवहारातच नसून संत ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितल्याप्रमाणे, अवघ्या चराचरावर अशी माया निर्माण करणे असे प्रगटीकरण माणसांमध्ये दिसून येईल.

आता प्रश्न असा की एवढे अध्यात्याबद्दल सांगण्याचे प्रयोजन काय? मुळात अध्यात्म म्हणजे काय हे आपल्याला समजल्याशिवाय आपण ज्येष्ठांची काळजी का, कशी घ्यायची याचा उलगडा होईल. अर्थात इथे अनेक जण असे असतील की ते आपल्या आई-वडिलांची उत्तम काळजी घेत आहेत तेही ” हा विषय लक्षात न घेता किंवा न समजता. म्हणजे खऱ्या अर्थाने ते ‘अध्यात्म ‘जगत आहेत. आपल्या घरातील विस्मरण झालेले लोक पूर्वी ”normal” होते. पण कालांतराने वाढत्या वयाबरोबर त्यांच्या मेंदूतील स्मरणाच्या पेशी काम करेनाशा झाल्या. अशा पेशी (हृदय मेंदू)यातील पुन्हा त्यांना पुनरुत्पादन नाही म्हणून त्यांचा उपयोग होत नाही व मेंदूचा तो भाग किंवा केंद्र कार्य करत नाही. एरवी त्या माणसाचे जगणे ”normal असते. पण थोड्या वेळापूर्वी केलेली किंवा झालेली गोष्ट त्यांना आठवत नाही. मग अशा लोकांचे ‘संगोपन ‘एखाद्या वर्षाच्या मुलासारखे करावे लागते म्हणजे अगदी निरागस मुलासारखी असतात. यावेळी ते लोक कसे वागतात हे तुम्हाला अनुभवाने माहीत झालेले आहे.

कोणत्या गोष्टीत काळजी घ्यायची याची उजळणी आपण घेऊया.

१) आहार – संगोपन करताना अगदी प्रथम विचार त्यांच्या आहाराचा येतो त्या लोकांना काहीच उद्योग नसल्याने सतत भूक लागली आहे किंवा चहा घ्यायचा राहिला आहे असे वाटत राहते आणि ते सतत खायला दे चहा दे म्हणत राहतात प्रथम प्रथम आपण त्यांना दोन-तीन वेळा चहा किंवा खायला देतो पण ते पचत नाही चहाने ऍसिडिटी वाढते मग याच्यावर उपाय काय तर सुरुवातीलाच खायला देताना कमी खायला द्यायचं आणि पुन्हा मागितलं की पुन्हा खायला देतो म्हणजे योग्य प्रमाणात अन्नसाठा त्यांच्या पोटात जाईल त्यांना अपचन होणार नाही तसेच चहाच चहा देताना सुद्धा कपबशी चिखली उचलायचीच नाही म्हणजे त्यांना सांगता येतं की बघा मगाशी तुम्ही चहा प्यायला की नाही अजून कप बशी सुद्धा उचलल्या नाहीत किंवा अर्धा अर्धा कप दोनदा चहा दिल्यानंतर त्यांचं समाधान होतं. त्यांचा आहार सकस, पौष्टिक पण पचनास हलका असा ठेवावा.

दुसरी गोष्ट ही माणसे एखादी गोष्ट मना विरुद्ध झाली तर चिडचिड करतात. प्रसंगी व्हायोlant होतात. त्यासाठी त्यांच्या मनामनाने घ्यावे लागते. त्यांच्यावर ओरडू नये किंवा तुम्हाला कसे कळत नाही हो? असे म्हणू नये कारण अशा वागण्याने ते आणखी चिडतात. म्हणून आपणच शांत रहायला हवे.

३) तुम्हाला अमुक गोष्ट आठवते आहे का? असे विचारून, त्यांच्या स्मरणशक्तीला ताण देऊन गोंधळात पाडू नये.

४) विस्मरण होणे हा गुन्हा नाही. म्हणून घरातल्या कार्यक्रमात किंवा कोणाला कोणी भेटायला आले तर त्यांना आपल्या खोलीत न पाठवता आपल्याबरोबर बसून घ्यावे. त्यांनीही त्या गप्पा ऐकाव्यात. पाहुण्यांना त्यांच्या आजाराची कल्पना द्यावी. खरं म्हणजे हा आजार नाही तर ती बौद्धिक पातळीवर एक स्टेज आहे. आणि अवघ्या घराला त्याचा सामना करावा लागतो.

५) कुणी कोरडी सहानुभूती आपल्याला किंवा त्या व्यक्तीला दाखवत असल्यास सौम्य शब्दात त्या व्यक्तीला थांबवावे.

६) घरातील व्यक्तीला अशी स्थिती असल्यास घरात प्रथम भीती, चिंता वाटते. म्हणजे करणाऱ्या माणसालाही आणि करून घेणाऱ्या माणसालाही. त्यातून असुरक्षितता येते. म्हणून अशी परिस्थिती हाताळताना जिभेवर खडीसाखर आणि डोक्यावर बर्फ ठेवून वागावे लागते. अध्यात्माने ही मन:शक्ती वाढते.

मग या आजारातून त्या व्यक्तीचे जीवन सुखकर आणि आपले सुकर होण्यासाठी काहीतरी वागण्यातील पथ्य पाळावी लागतील.

१) स्पर्श_स्पर्शातून न बोलता अनेक भावना व्यक्त होतात. पाठीवर हात ठेवला तर तो ‘आश्वासक’ स्पर्श असतो. डोक्यावरून गालावरून हात फिरवला तर प्रेमाची जाणीव होते. त्या व्यक्तीच्या झोपेच्या वेळी हातापायावरून हात फिरवल्यास मायेची ऊर्जा, ऊब जाणवते. माणूस स्पर्शासाठी भुकेला आहे. म्हणून आपल्याला जेव्हा जमेल तेव्हा त्यांच्याजवळ बसून, हात हातात घेऊन किंवा पाठीवर ठेवून त्यांच्याशी बोलावे. ती माया त्यांना समजते. कदाचित पुढच्या दहा मिनिटात ते विसरतील. पण तो क्षण महत्त्वाचा असतो.

 २) भाषा_ त्यांच्याशी ओरडा ओरडा करत न बोलता गोड भाषेत सावकाश बोलावे. या वयाच्या माणसांना ऐकू कमी येते आणि गडबडीने बोलल्यास त्यांना समजत नाही. मग ते चिडचिड करतात.

३) चेहऱ्यावरील भाव आपण त्यांच्याशी बोलत असताना आपल्या चेहऱ्यावर तसा भाव यावा. म्हणजे घरातील आनंदात आपल्याला सामील केले आहे हे त्यांना समजते. रागीट चेहरा करून बोलल्यास ते मनात खट्टू होतात आणि नकारात्मक भावना निर्माण होतात.

४) देहबोली _यांच्याशी बोलताना नॉर्मल देहबोली असावी. एखादी जुनी गोष्ट असेल तर त्यावेळची देहबोली कशी असेल त्याप्रमाणे ठेवावे म्हणजे कदाचित क्षणभरासाठी का होईना त्यांना भूतकाळ आठवतो का ते लक्षात येईल.

५) त्यांना स्वावलंबी ठेवावे. स्वतःची कामे स्वतः करत असतील तर ती करू द्यावी. उगीच पसारा पडतो म्हणून त्यांच्या काम करण्यात अडथळा आणू नये.

त्यांचे छंद जोपासावेत. म्हणजे एखाद्याला पूर्वीच्या गाण्याची आवड असेल तर जुनी गाणी त्यांची आवडती असतील ती लावून ठेवावे. कदाचित त्यातून भूतकाळ आठवेल आणि आता म्युझिकल थेरपी अनेक आजारांवर उपयुक्त ठरत आहे. त्या व्यक्तीवरही त्याचा काही परिणाम झाल्यास चांगलेच असेल.

दोन एखाद्याला चित्रकलेची आवड असेल तर कागद पेन पेन्सिल रंग त्यांच्यासमोर आणून ठेवावे. आणि चित्र पूर्ण झाल्यावर ‘ चित्र सुंदर काढलेत ‘अशी प्रशंसा करावी.

बायकांना स्वयंपाकाची आवड असते. त्यांना पोळ्या करणे, कुकर लावणे हे करू द्यावे. फक्त त्यावेळी आपण आजूबाजूला असावे. म्हणजे पाणी, गॅस वगैरे कडील लक्ष राहील.

सडा घालणं, रांगोळी काढणे या गोष्टी करू द्याव्यात. त्याचे कौतुक करावे. देवपूजा करून घ्यावी. माणसाला आपला घरात अजूनही उपयोग होतो आहे ही भावना सुखावह असते.

— भाग पहिला 

💦🌨️

लेखिका : डॉ. सौ. पुष्पा घळसासी

प्रस्तुती : शुभदा भा.कुलकर्णी (विभावरी)

कोथरूड -पुणे.३८.

   मो.९५९५५५७९०८ 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ।। श्री नारद उवाच ।। – नारद भक्ति सूत्रे — सूत्र ३७ व ३८ ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ☆

श्री संदीप रामचंद्र सुंकले

? इंद्रधनुष्य ?

।। श्री नारद उवाच ।। – नारद भक्ति सूत्रे — सूत्र ३७ व ३८ ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले 

।। श्री नारद उवाच ।। 

 नारद भक्ती सूत्र क्र. ३७ आणि ३८.

भक्तीसूत्र ३७ – – 

लोकेऽपि भगवतगुणश्रवणकीर्तनात् ॥३७॥

अर्थ :- साधकाने प्रपंचातील कामे करताना, लोकांमध्ये वावरताना भगवंताच्या गुणांचे श्रवण आणि कीर्तन करावे म्हणजे भक्ति संपन्न होते.

विवेचन:

मागील छत्तिसाव्या सूत्राचेच हे अधिक स्पष्टीकरण आहे असे म्हटले तरी चालेल. तेथे ‘भजन’ असे पद आहे. भजनात श्रवण-कीर्तनादिकाचाही अंतर्भाव होतो. लोकव्यवहारात भक्ती उत्पन्न होण्याकरिता भगवद्‌गुण श्रवण-कीर्तनादि साधनाचा अवलंब केला जातो. सत्संगतीत श्रद्धापूर्वक हरिगुण श्रवण-कीर्तनादिकानेच अंतःकरणात भगवतभाव निर्माण होतो व प्रेमवृद्धी होत असते. असा सर्व भक्तिमान पुरुषाचा अनुभव आहे.

आज संवादाची अनेक साधने उपलब्ध आहेत. माध्यम कोणतेही असले तरी त्याचा मुख्य हेतू ‘सुसंवाद’ हाच असतो आणि तोच असायला हवा. येत्या काळात आणखी काही साधनांची भर यात पडू शकेल. तंत्रज्ञान कितीही प्रगत झाले तरी ‘श्रवणकला’ अपरिहार्य राहील, यात दुमत असणार नाही.

दैनंदिन व्यवहार पाहिला तर लोकांची ऐकून घेण्याची क्षमता आज खूप क्षीण होत चालली आहे असे लक्षात येते. सध्या वैयक्तिक जीवनात आणि सामाजिक जीवनात एक गोष्ट लक्षात येते की एकतर लोकं पूर्णपणे ऐकत (श्रवण) नाहीत किंवा त्यांना ऐकायचेच नसते. आपलं लोकांनी ऐकावं असे प्रत्येकाला वाटते, परंतु दुसराही असा विचार करीत असेल, हे त्याच्या ध्यानातच येत नाही. याचा परिणाम असा होतो की लोकं स्वतःला व्यक्त करायचे टाळतात आणि त्यांच्या मनात अनेक बऱ्यावाईट गोष्टीं साचत जातात. जरा, आजूबाजूला डोळे उघडे ठेवून पाहिले तर याचे दुष्परिणाम प्रत्येकाला नक्कीच जाणवतील, काही जणांनी याचे चटके भोगलेही असतील, सहनही केले असतील.

– – सांगण्याचा मुद्दा असा आहे की जो मनुष्य शांतचित्ताने, पूर्ण एकाग्र होऊन श्रवण करतो, *त्याच्या मनाचा तळ आणि मनाच्या तळाशी असलेला मळ दोन्हीही अगदी स्वच्छ होऊन जाते*. उत्तम श्रोता असलेला मनुष्य कोणताही विषय सहज समजून घेऊ शकतो आणि त्यामुळे त्याची लौकिक आणि पारलौकिक जीवनात यशस्वी होण्याची शक्यता जास्त असते. नज्याला साधक व्हायचे आहे, त्याने आधी ऐकायला शिकावे. काय ऐकायचे? कसे ऐकायचे? कोणाचं ऐकायचे याचा विचार आपण पुढील लेखांत करू. जाता जाता एक वाक्यावर आपण चिंतन करू. *’समोरचा मनुष्य जे बोलतो ते ऐकायलाच हवे परंतु तो जे बोलू शकत नाही ते सुद्धा ऐकता यायला हवे. ‘*

– – मनुष्याला भगवंताने दोन कान आणि एक तोंड दिले आहे. कान ऐकण्याचे एकच काम करते, परंतु एकमेव असलेले तोंड बोलणे आणि खाणे अशी दोन कामे करीत असते. मनुष्याने दोन्ही कानांनी नीट लक्षपूर्वक ऐकावे आणि त्यानुरूप उत्तम अशी कृती केली जावी अशी भगवंतांची ईच्छा असावी. परंतु, सामान्यपणे मनुष्य बरेचवेळा नीट ऐकत नाही आणि जिथे त्याचा स्वार्थ साधला जाईल, तीच कृती करतो. यामुळे जरी तत्काळ फायदा होत असला तरी मनुष्याच्या पूर्ण आयुष्याचा विचार केला तर ते घातक ठरण्याची शक्यता जास्त असते. म्हणून मनुष्याने ‘अवधान’ देऊन ऐकावे आणि आपल्या सद्गुरूंना भूषण वाटेल अशी कृती करण्याचा प्रयत्न करावा. यासाठी ‘विवेका’ची कास धरावी. जो मनुष्य प्रत्येक गोष्ट विवेकाने करतो, तो मनुष्य यशस्वी होतो असे सर्व संत सांगतात.

*”ऐसें हें अवघेंचि ऐकावें । परंतु सार शोधून घ्यावें ।*

*असार तें जाणोनि त्यागावें । या नांव श्रवणभक्ति।।”*

(दा. 4. 1. 29)

भगवदगुण श्रवण हे अनेक अंगाने होत असते. कीर्तीश्रवण, चरित्रश्रवण, लीलाश्रवण, अवतारकथाश्रवण, भजनश्रवण, इ. नवविधा भक्तीमध्ये श्रवणभक्ती ही प्रथम सांगितली आहे. संसारातही एखाद्या वस्तूचे नाम व त्या वस्तूचे विशेष गुण याचे ज्ञान त्या त्या वस्तूचा वाचक जो शब्द त्याच्या श्रवणानेच होते. त्या वस्तूच्या ठिकाणी अनुकूल बुद्धी असली म्हणजे त्या वस्तूचे प्रेम निर्माण होते, म्हणून कथाश्रवणानेच भगवदभक्ती निर्माण होत असते.

*”तरी अवधान एकले दीजें । मग सर्व सुखासि पात्र होईजे । हें प्रतिज्ञोत्तर माझें । उघड ऐका ।।*

(ज्ञा. 9. 1)

श्रीज्ञानेश्वर माऊली म्हणतात, *’अहो श्रोते हो, तुम्ही एकवेळ श्रवणाकडे लक्ष द्या, म्हणजे मग सर्व सुखाला पात्र व्हाल. हे माझे उघड प्रतिज्ञेचे बोलणे ऐका. *

“ज्ञाना’ची ईश्वर असलेली आपली ज्ञानेश्वरमाऊली आपल्याला कळकळीने सांगत आहेत की श्रोते जनहो अवधान देऊन ऐका. अवधान म्हणजे कोणतेही कार्य करण्यासाठी प्राण्याने केलेली देह-मनाची सिद्धता होय. अवधानात जाणिवेचे केंद्रीकरण असते आणि इष्ट विषय जाणिवेच्या केंद्रस्थानी आणला जातो. थोडक्यात, अवधान देणे म्हणजे नीट लक्ष देऊन ऐकणे.

– – *मनुष्य अवधान देऊन ऐकायला शिकला तर त्याच्या जीवनातील ५०% समस्या कमी होतील असे वाटते. आपण ‘अवधानी’ होण्याचा प्रयत्न करू. *

जय जय रघुवीर समर्थ।

भक्तिसूत्र ३८ – – 

मुख्यतस्तु महत्कृपयैव भगवत्कृपालेशाद्वा ॥ ३८ ॥

अर्थ : प्रामुख्याने पराभक्ती ही केवळ सत्पुरुषांच्या कृपेमुळेच किंवा भगवंताच्या अल्पशा, अंशात्मक कृपेमुळेच प्राप्त होत असते.

विवेचन :

मागील चौतिसाव्या सूत्रात त्या भक्तिप्राप्तीची साधने आचार्यगुण सांगतात असे सांगून पुढील सूत्रातून विषयत्याग, संगत्याग, अव्यावृत भजन, भगवद्‌गुण-श्रवण, कीर्तनादि साधनांचा अनुवाद केला आहे. जेव्हा अनेक साधने सांगितली जातात तेव्हा त्यांत गौणमुख्यभाव निर्माण होतो, मग या साधनांत श्रेष्ठ व मुख्य कोण, असा संशय आला असता या अडतिसाव्या सूत्रात त्याचे उत्तर देतात. ही मागील साधनेही तत्त्वतः अमुख्यच आहेत. मुख्य साधन महात्मे जे संत त्यांची कृपा अथवा भगवतकृपेचा अंश का होईना पण तो प्राप्त होणे हे आहे. जे जे भक्तिमान पुरुष म्हणविले गेले ते महात्म्यांच्या कृपेने किंवा भगवत्कृपेनेच प्रेमभक्तीचे अधिकारी बनले. इतर सर्व साधनांना फलद्रूप होण्याकरितादेखील महात्म्यांची कृपा लागते.

शेतकऱ्याने धान्य पिकविणे आणि साधकाने भगवंत प्राप्तीसाठी साधना करणे या दोन गोष्टी वेगवेगळ्या आहेत असे मला वाटत नाही. दोन्ही ठिकाणी फळ अपेक्षित आहे. जो हाडाचा शेतकरी आहे, तो अन्य फुटकळ गोष्टीत वेळ न घालवता, आपल्या जमिनीची पुरेशी मशागत करतो. पावसाचा अंदाज घेऊन उत्तम अशा बियाण्याची पेरणी करतो. आवश्यक ती खते पुरवितो, शेतात मध्येच उगवणारे तण काढतो. बांधबंदिस्ती करतो. पाखरांपासून शेताची राखण करतो. पीक चांगले येईल या एका आशेने देवावर विश्वास ठेवून तो हे सर्व काही करीत असतो. जमिनीत पेरलेले बियाणे नक्की रुजेल असा त्याचा विश्वास असतो. यातील एक पाऊस सोडला तर बाकीच्या गोष्टी सर्वसाधारणपणे त्याच्या हातात असतात. भगवंत योग्य वेळी आणि योग्य प्रमाणात पाऊस पाडतो, तेव्हा शेतकऱ्याला मुबलक आणि उत्तम प्रतीचे धान्य मिळते असे म्हटलं तर अतिशयोक्ती होणार नाही. परमार्थ साधनेत सुद्धा हेच सूत्र उपयोगी पडते. साधक साधना नेटाने करू शकतो, पण त्यावर पाऊस रुपी कृपेचा वर्षाव करणे हे निव्वळ त्याच्या कृपेमुळेच शक्य आहे. अनेक साधकांचे चरित्र अभ्यासले तर आपल्याला सहज लक्षात येईल.

सर्वश्रेष्ठ भक्त प्रल्हादाचे चरित्र आपण पाहू. बाळ प्रल्हाद नारायण नारायण असा जप करीत असे. त्याच्या पित्याने त्याला अनेक वेळा, अनेक प्रकारे छळले. त्याने ते सर्व छळ अत्यंत शांत राहून सोसले. मग भगवंताला दया आली आणि मग तो स्तंभातून प्रगट झाला. अमुक एक गोष्ट केली की भगवंत प्रगट होतो, दर्शन देतो असे सांगता येणार नाही.

माता शबरी भगवंत येणार म्हणून आपली कुटी सजवत होती, आपल्या घरासमोरील पायवाट झाडून ठेवत होती. असे करता करता ती वृद्ध झाली, मग एक दिवस प्रभू श्रीराम तिच्या कुटीत आले. तिच्या हातची उष्टी बोरे खाल्ली.

महर्षी नारद एक गोष्ट इथे अधोरेखित करतात, ती म्हणजे सत्संगती. काहीही झाले तरी साधकाने सत्संगती सोडू नये. आणि आजच्या भीषण कलियुगात नामासारखी शुद्ध संगत असूच शकत नाही असे सर्व संत सांगतात.

संत तुकाराम महाराज म्हणतात,– –

“नाम घेता वांयां गेंला । ऐसा कोणे आईकिला ॥१॥ 

सांगा विनवितो तुम्हांसी । संत महंत सिद्ध ॠषी ॥२॥ 

नामे तरला नाही कोण । ऐसा द्यावा निवडून ॥३॥ 

सलगींच्या उत्तरा । तुका म्हणे क्षमा करा ॥४॥”

(संदर्भ~ अभंग क्रमांक २२७३. सार्थ तुकाराम गाथा धार्मिक प्रकाशन संस्था.) 

जय जय रघुवीर समर्थ!

– – नारद भक्तीसूत्र ३७ आणि ३८..

© श्री संदीप रामचंद्र सुंकले (दास चैतन्य)

थळ, अलिबाग. 

८३८००१९६७६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “कालिया-मर्दनासाठी मृत्यूच्या डोहात उडी घेणारा वीर!!” ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

☆ “कालिया-मर्दनासाठी मृत्यूच्या डोहात उडी घेणारा वीर!!” ☆ श्री संभाजी बबन गायके

पासष्ट वर्षांच्या आजी श्रीमती रत्ना राय यांना त्यांचा नातू सुट्टीवर घरी येणार आहे, असं वाटतं आहे. घरची कर्ती माणसं त्याला विमानतळावर घ्यायला गेलीत… असं तिला सांगण्यात आलंय. एप्रिल, २००३. याच महिन्याच्या तिस-या आठवड्यात येतो म्हणून त्यानं कळवलं होतं… पण एक तातडीची मोहीम पूर्ण करायचा आदेश आल्याने आता शेवटच्या आठवड्यात ‘येईन’ असं कळवलं आहे. संजोग त्याचं नाव. सिक्कीम राज्यातल्या नामची जिल्ह्यातल्या बूमतार गावात ही राय मंडळी राहतात. रत्ना राय यांची कन्या भारती त्यांच्या धाकट्या सूनबाई. परंतू त्यांच्या धाकट्याचं अकाली निधन झालं होतं. त्यानंतर भारती यांनी नेपाळी वंशाच्या कमल छेत्री यांच्याशी पुनर्विवाह केला. हा आंतरराज्य विवाह म्हणता येईल असा विवाह. रेल्वे कर्मचारी असलेले कमल संजोग आणि मुलगी संजीता यांना भारती यांच्या पदरात टाकून देवाघरी निघून गेले. त्यावेळी संजोग केवळ दोन वर्षांचे होते. संजोग आणि संजीता यांचा सांभाळ सरकारी वकील असलेल्या मोठ्या काकांनी, जे. बी. राय यांनी केला.

संजोग धाडसी खेळांत वाकबगार होते. नामची येथील सरकारी महाविद्यालयात बी. ए. च्या दुस-या वर्षात असतानाच ते काकांच्या विरोधाला न जुमानता वर्ष २००१ मध्ये ११, गोरखा रेजिमेंटमध्ये जवान म्हणून त्यांच्या वयाच्या अठरा-साडे अठराव्या वर्षी भरती झाले… अंगभूत शौर्य, धाडस, साहस या गुणांना लष्करातच वाव मिळेल, असे संजोग यांचे पक्के मत होते… आणि भविष्यात ते खरे ठरले! दोन वर्षांचे खडतर प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर रेजिमेंटमध्ये स्थिरावत असताना त्यांना आणखी काही विशेष करून दाखवण्याची प्रबळ इच्छा झाली. मनात शौर्याचे धगधगते अग्निकुंड पेटते असणा-या आणि शारीरिक, मानसिकदृष्ट्या अतिशय बलवान असलेल्या सैनिकांचे एक स्वप्न असते… स्पेशल फोर्सेस मध्ये कमांडो बनणे. यासाठी अतिशय म्हणजे अक्षरश: अतिशय खडतर परीक्षा, प्रशिक्षण पार करावे लागते… आणि ‘बलिदान’ बॅज ‘कमवावा’ लागतो. संजोग छेत्री यांनी ही कमाई केली! एकतीस मार्च २००१ रोजी संजोग छेत्री ९, पॅराशूट रेजिमेंट, स्पेशल फोर्सेस मध्ये कमांडो म्हणून मोठ्या अभिमानाने रुजू झाले.

 स्पेशल फोर्सेस जम्मू-कश्मीरमध्ये अतिरेक्यांविरोधात सातत्याने मोहिमेवर असते. बावीस एप्रिल, २००३चा दिवस होता. काश्मिरात बर्फवृष्टी होऊन गेलेली होती. टेहळणी करणा-या हेलिकॉप्टरला काश्मिरातील, पीर पंजाल पर्वतराजीनजीकच्या पूंछ भागातल्या सुरनकोट येथील एका जंगलातल्या उंच टेकडीवरील एके ठिकाणी एका गुहेपर्यंत उमटलेली असंख्य पावलं नजरेस पडली. काळजीपूर्वक योजना आखली गेली. वीस कमांडोज या SAD (Search & Destroy) मोहिमेसाठी निवडण्यात आले… पॅराट्रूपर संजोग छेत्री या तुकडीत होतेच. काका टॉप नावाच्या जिथून भारतीय सैनिकांच्या हालचाली दिसू शकतील अशा एका गुहेत सुमारे तेरा-चौदा अतिरेकी लपून बसल्याची खबर होती. जणू विषारी सर्पच. यांना शोधून ठेचून काढायला हवेच… मोहिमेचे नाव ठरले… ऑपरेशन सर्पविनाश!

पण या कालिया-मर्दनासाठी सैनिकांना अदृश्य अशा डोहात उडी घ्यावी लागते. अतिरेकी लपले आहेत, अशा ठिकाणापासून खूप अलीकडे वाहने थांबवून पायी त्या जागेकडे निघावे लागते. मोहीम गुप्त ठेवावी लागते. वाटेत लागणारी गावे, त्यांतील अतिरेक्यांचे प्रशंसक, साहाय्यकर्ते यांना गाफील ठेवत मोहीम राबवावी लागते. यात कित्येक किलोमीटर्स बर्फात, अंधारात, डोंगर-दरीतून, घनदाट झाडीतून चालत जावे लागते… सोबत शस्त्रांचे ओझे असतेच! शत्रूच्या लपण्याच्या संभाव्य ठिकाणाला सा-या बाजूंनी वेढा घालावा लागतो…

 संजोग छेत्री त्या गुहेच्या दिशेने आपल्या इतर साथीदारांसह सावध पावले टाकीत निघाले. गुहेच्या पुढे बरीच मोकळी जागा होती.. या जागेत दगडधोंडे, गवत होतेच. कमांडोज गुहेपासून शंभरेक यार्ड्स वर पोहोचलेले असतानाच गुहेत लपलेल्या सर्पांना गरुडांचा सुगावा लागला! पाकिस्तानातून प्रचंड शस्त्रसाठा घेऊन आलेले अतिरेकी… त्यांनी तुफान गोळीबार आरंभला… अंदाधुंद. वेढ्यात असलेल्या अन्य कमांडोजच्या जीवाला धोका उत्पन्न झाला… संजोग यांनी स्वत: निर्णय घेतला… थेट भेट गनिमांना! ते कोपर-गुडघ्यांवर रांगत-रांगत ते शंभर यार्ड अंतर गुहेच्या अगदी तोंडाशी पोहोचले… गुहेत बसून आरामात गोळीबार करणा-या अतिरेक्यांच्या समोर संजोग यमराज बनून उभे ठाकले… गुहेतून एक अतिरेकी गोळीबार करीतच बाहेर पडला… बिळातून पहिला सर्प जणू! कमांडो संजोग यांचा नेम चुकणार नव्हताच. त्याच्या पाठोपाठ दुसरा बाहेर निघाला… त्याचीही तीच गत झाली! पण गुहेच्या आतून अकरा रायफली धडाडत होत्या… शेकडो गोळ्या! त्यांतील अनेक गोळ्यांनी संजोग यांच्या देहाचा वेध घेतला… कालिया मर्दनासाठी आलेला बालकृष्ण कोसळला! अतिरेक्यांनी तरीही त्यांच्यावर काही फैरी झाडल्या… निश्चितीसाठी! आतला एक जण आता बाहेर पडला… निपचित पडलेल्या या देहाचा हात हलला… कमरेला लावलेला सुरा (आर्मी नाईफ/खुखरी) उपसला गेला… देह उभा ठाकला… तिस-या अतिरेक्याचा मृत्यूदूत! रक्तबंबाळ झालेल्या या देहानं त्या अतिरेक्यावर मरणाची झडप घातली… त्याच्या नरडीचा घोट घेतला आणि मगच पुन्हा धरणीमातेच्या मांडीवर मस्तक ठेवलं… (२६ जून, १९८२ ते २२ एप्रिल, २००३) आणि त्या केवळ वीस वर्षे, नऊ महिने आणि सत्तावीस दिवसांचे आयुष्य जगलेल्या देहातील आत्म्याने परलोकीची वाट धरली!

 उरलेले अकरा अतिरेकी बाहेर पडून पांगले… संजोग छेत्री यांच्या बलिदानाने पेटून उठलेले कमांडोज आता त्यांना काहीही झाले तरी जिवंत ठेवणार नव्हतेच. त्यांनी त्यांपैकी दहा सर्पांचा विनाश केला… अकरावा पाकिस्तान-प्रशिक्षित सर्प जिवंत धरला! एकूण तेरा अतिरेकी त्यांच्या ‘आखरी अंजाम’ पर्यंत पोहोचवले गेले! हे साप देशाच्या आतल्या भागांत शिरले असते तर?

 सर्पविनाश मोहिमेत २००३ मध्ये सुमारे १०० अतिरेक्यांचा विनाश करण्यात आपल्या सैनिकांना यश लाभले. पण यांत अनेक सैनिक आणि नागरीकांना आपले प्राण द्यावे लागले. या सर्वांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दरवर्षी एप्रिल महिन्यात या भागात ‘हिल काका स्मृती दिन’ पाळण्यात येतो.

 ‘अशोक चक्र’… शांतता काळात सैनिक, नागरिक यांना दिला जाऊ शकणारा, परमवीर चक्राच्या दर्जाचा, सर्वोच्च पुरस्कार पॅराट्रूपर संजोग छेत्री यांना मरणोत्तर जाहीर करण्यात आला तो दिवस होता १५ ऑगस्ट, २००३! संजोग छेत्री यांच्या भगिनी संजीता यांनी भारताच्या तिन्ही संरक्षण दलांचे सुप्रीम कमांडर, तत्कालीन राष्ट्रपती महोदय डॉक्टर ए. पी. जे. अब्दुल कलाम साहेब यांच्या हस्ते आपल्या शूर भावाच्या वतीने ‘अशोक चक्र’ पदक स्वीकारले!

 सैनिकांची दुनियाच न्यारी! इथे जखमा अभिमानाने मिरवल्या जातात! किती शौर्य पदके, पुरस्कार मिळवले यांच्या आकडेवारीचा अभिमानाने उल्लेख केला जातो, हौतात्म्य पत्करलेल्या बहाद्दर सैनिकांच्या स्मृती जतन करून ठेवल्या जातात. ९, पॅराशूट रेजिमेंट (स्पेशल फोर्सेस) ने इतर अनेक सन्मान प्राप्त केलेले आहेतच… पण तब्बल चार ‘अशोक चक्र’ पुरस्कार त्यांनी पटकावलेले आहेत! संजोग छेत्री, मेजर सुधीर वालिया साहेब, कॅप्टन अरुण सिंग जसरोटीया साहेब आणि लान्स नाईक मोहन गोस्वामी साहेब यांना मरणोत्तर हा सन्मान प्राप्त झाला आहे. संजोग छेत्री यांचा आदर्श समोर ठेवून सिक्कीमचा एच. शेर्पा नावाचा तरुण २०२४ मध्ये एन. डी. ए. मध्ये निवडला गेला… त्याने संजोग छेत्री यांच्या बलिदानातून प्रेरणा घेतली! ‘अशोक चक्र’ प्राप्त करणारे सर्वांत कमी वयाचे सैनिक म्हणून संजीव छेत्री यांची आजवरच्या इतिहासात नोंद आहे! आपले हे कोवळे तारुण्य भारतमातेच्या चरणी अपर्ण करणा-या संजोग छेत्री यांना प्रणाम.

हा लेख तरुणांना वाचायला मिळेल, असा प्रयत्न केला गेला तर बरे! जय हिंद.

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ डॉ. बेनझीर तांबोळी… लेखिका – ॲड. शैलजा मोळक ☆ श्री जगदीश काबरे ☆

श्री जगदीश काबरे

? इंद्रधनुष्य ?

☆ डॉ. बेनझीर तांबोळी… लेखिका – ड. शैलजा मोळक ☆ श्री जगदीश काबरे ☆

डॉ. बेनझीर तांबोळी 

आज हिंदू – मुस्लीम धर्मात जाणीवपूर्वक निर्माण केल्या जाणाऱ्या द्वेषमूलक वातावरणात मुस्लीम सत्यशोधक मंडळाच्या माध्यमातून कार्यरत असणारे डॅा. बेनझीरडॅा. शमसुद्दीन तांबोळी या उभयतांना गेल्या विसेक वर्षापासून मी ओळखते. काही माणसांचा, त्यांच्या विचारांमुळे व कृतीमुळे प्रचंड आदर वाटतो अशा काही मंडळींपैकी ही एक जोडी. ज्या जमातीविषयी अनेक लोक समाजात विविध गैरसमज पसरवत असतात, त्याच जमातीतील डॅा. बेनझीर तांबोळी यांचा शैक्षणिक व सामाजिक आलेख पाहता त्यांच्याविषयीचा आदर अधिक दुणावतो.

एम ए (इंग्रजी), एम ए (मराठी), एम. एड, सेट, पीएच डी. हा त्यांचा शैक्षणिक प्रवास.

डॉ. बेनझीर तांबोळी यांचा शिक्षण, साहित्य, समाजप्रबोधन या क्षेत्रात सातत्यपूर्ण सक्रिय सहभाग राहिला आहे. त्यांचे आईवडिल शिक्षकी पेशातील असल्याने त्यांना सुशिक्षित, मध्यमवर्गीय मुस्लीम कुटुंबात वाढताना खुले, प्रोत्साहनात्मक वातावरण लाभले. परंतु परंपरावादी कुटुंबात झालेल्या पहिल्या विवाहानंतर झालेला तलाक, त्यातून निर्माण झालेली वैयक्तिक आणि कौटुंबिक अस्थिरता व कटू अनुभवामुळे त्यांच्या आयुष्याला वेगळे वळण मिळाले. व्यक्तिगत मानसिक ताण, नातेवाईक आणि समाजाचा दबाव तसेच भविष्यातील अनिश्चितता यांना तोंड देत त्यांनी स्वतःला पुन्हा उभं केलं. आईवडीलांनी दिलेल्या शैक्षणिक वातावरणामुळे त्यांनी धाडसाने या दरम्यान रयत शिक्षण संस्थेच्या महाविद्यालयात इंग्रजीचे अध्यापन केले. स्वावलंबनाची ओढ आणि योग्य निर्णयक्षमता यामुळे त्यांची पुढची वाटचाल सुकर झाली. कितीही कठीण प्रसंग आले, तरी त्याला टक्कर देण्याची हिंमत, खंबीर मानसिकता, आत्मविश्वास आणि शिक्षणामुळेच मिळते तसेच ‘आर्थिक स्वावलंबन स्वतःचा आवाज बळकट करते’ ही त्यांची धारणा कठीण काळातील अनुभवातूनच घडली आहे. त्यांचा स्वभाव मुळातच लढणारा असल्याने त्याचा फायदा त्यांना झाला.

कालांतराने सामाजिक कार्यकर्ते आणि मुस्लीम सत्यशोधक मंडळाचे सध्याचे अध्यक्ष डॉ. शमसुद्दीन तांबोळी यांची साथ आणि सहकार्यामुळे त्यांचे शैक्षणिक आयुष्य अधिक दृढ होत गेले. बी. एड. , एम. एड. , सेट परीक्षा आणि पीएच. डी. या टप्प्यांवर त्यांचा त्यांना कायम पाठिंबा मिळाला. विवाहानंतर स्वतःला मूल न होऊ देण्याचा निर्णय त्यांनी खूप विचार करून घेतला जो कुटुंबातील अनेकांना रुचणारा नव्हता. तरीही त्या आपल्या निर्णयावर ठाम राहिल्या. पतीची योग्य साथ त्यांना मिळाली.

आंतरधर्मीय विवाहाच्या निमित्ताने अनेक तरुण तरुणी भावनिकतेने जोडले गेले आहेत. त्यातून त्यांचा एक मोठा परिवार तयार झाला आहे.

अध्यापन आणि भाषा अभ्यासाची आवड असल्यामुळे त्यांनी दोन दशकांहून अधिक काळ भाषा आणि शिक्षण क्षेत्रातील विविध प्रकल्पांमध्ये काम केले. टिळक महाराष्ट्र विद्यापीठ आणि अन्य महाविद्यालयांमधील अध्यापन, तसेच एमकेसीएलच्या शैक्षणिक उपक्रमांमधील सहभाग या माध्यमातून त्या विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडल्या गेल्या. इंग्रजी, मराठी आणि शिक्षणशास्त्रातील पदव्युत्तर शिक्षणासोबतच भाषा कौशल्य विकसनावर त्यांनी केलेले संशोधन महत्त्वाचे आहे. विविध परीक्षांसाठी प्रभावी प्रश्ननिर्मिती कशी करावी व सर्वंकष मूल्यमापन यावर शिक्षकांसाठी त्या विशेष मार्गदर्शन करतात. तसेच मराठी, हिंदी व इंग्रजी या तीनही भाषांत भाषांतर, मुद्रित शोधन व संपादन त्या अचूक करतात. सुरुवातीला कोल्हापूर येथे त्यांनी इंग्रजी भाषा व साहित्य या विषयाचे अध्यापन केले. त्यानंतर त्या पुण्यात आल्यावर त्यांचा शैक्षणिक व सामाजिक कामाचा परिघ वाढत गेला. पुण्यात त्या टिळक महाराष्ट्र विद्यापीठाशी अध्यापक म्हणून जोडल्या गेल्या. दूरदर्शन, आकाशवाणीवरील विविध कार्यक्रमात त्या चर्चा व परिसंवाद यात सहभागी होतात. विविध विषयांवर त्या व्याख्याने व लेख लिहितात.

शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रातील कामामुळे त्यांची स्वतःची ओळख निर्माण झाली. त्या विविध कामात कायम सक्रिय आहेत. मुस्लीम सत्यशोधक मंडळाच्या फातिमाबी शेख मुस्लीम महिला मंच आणि हमीद दलवाई शैक्षणिक उपक्रम यामाध्यमातून त्यांनी विविध जबाबदाऱ्या सांभाळल्या. मुस्लीम समाजातील पारंपरिक प्रश्न आणि आजचे वास्तव, मुस्लीम महिलांचे अधिकार आणि मुस्लीम समाजातील अपेक्षित सकारात्मक बदल, मुस्लीम महिलांच्या शैक्षणिक – सामाजिक समस्या, तोंडी तलाकसारखे प्रश्न, तसेच वंचितांच्या शैक्षणिक अडचणी यांसारख्या विषयांवर त्यांनी अनेकांगी कार्य केले आहे. विविध नियतकालिके, विशेषांक, वर्तमानपत्रे यामध्ये त्या प्रासंगिक लेखन करत असतात. मुस्लीम सत्यशोधक पत्रिकेचे संपादन सहाय्य आणि मुस्लीम सत्यशोधक मंडळाच्या द्विखंडात्मक इतिहासाच्या संपादनात त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. प्रभावशाली शिक्षणतज्ज्ञ, शिक्षणशास्त्र शब्दकोश ही त्यांची पुस्तके प्रकाशित आहेत. समान नागरी कायदा – अपेक्षा व वास्तव, तिमिरभेद ही दोन पुस्तके त्यांनी प्रकाशित केली आहेत. त्यांचा मुस्लीम प्रश्नावरील अनुवादित कथा संग्रह प्रकाशनाच्या मार्गावर आहे. शैक्षणिक क्षेत्रातच नव्हे तर साहित्याच्या माध्यमातून त्यांनी अनेक प्रश्न हाताळले आहेत. प्रबोधनाची व परिवर्तनाची कास धरल्याने त्या सर्वधर्मीय चळवळी व संघटना यांच्याशी निगडीत आहेत.

सामाजिक आणि राष्ट्रीय एकात्मतेचे उपक्रम, बकरी ईदनिमित्त रक्तदान अभियान, संविधान साक्षरता अभियान यांसारख्या समाजप्रबोधन व जनजागृतीपर उपक्रमांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग असतो. मुस्लीम सत्यशोधक मंडळ प्राधान्याने जोडीदाराच्या निवडीचे स्वातंत्र्य, आंतरधर्मीय–आंतरजातीय विवाहांना प्रोत्साहन आणि पाठिंबा देते. याविषयावर कार्य करणाऱ्या विविध राज्यातील संघटनांचे ‘चयन’ हे राष्ट्रीय संघटन उभे राहिले आहे. पुणे, लखनौ, कोलकाता, हैद्राबाद याठिकाणी झालेल्या परिषदांच्या समन्वयात महत्त्वपूर्ण जबाबदारी घेऊन यानिमित्त प्रकाशित करण्यात येणाऱ्या स्मरणिकेचे संपादन त्यांनी केले आहे. त्या करत असलेले काम हे देशव्यापी आहे. ध्येयवादी प्रामाणिक प्रयत्नातून समाजासाठी चाललेली त्यांची ही वाटचाल अनेकांना दिशादर्शक आहे. त्यांना नवी दिल्ली येथे साहस सन्मान, दौंड येथे जागर सन्मान, पुणे येथे सेवाव्रती महिला पुरस्कार असे अनेक सन्मान मिळाले आहेत.

आजच्या सामाजिक परिस्थितीत समाजात शांतता व सलोखा राखण्यासाठी डॅा. बेनझीर तांबोळी यांच्यासारखे अनेकजण कार्यरत आहेत. त्यांचे कार्य समजून घेणे व ते इतरांपर्यंत पोहोचवणे ही आपली जबाबदारी आहे.

आयुष्यात आलेल्या काही समस्या व संघर्ष यावर मात करून डॅा. बेनझीर यांनी केलेली आपली शैक्षणिक, सामाजिक व साहित्यिक वाटचाल ही लक्षणीय आहे. अशा या जिजाऊ – सावित्रीच्या कर्तृत्ववान लेकीला मानाचा मुजरा..! !

लेखिका – ड. शैलजा मोळक

(लेखक, कवी, संपादक, प्रकाशक)

अध्यक्ष, शिवस्फूर्ती प्रतिष्ठान, पुणे. मो. 9823627244

प्रस्तुती – श्री जगदीश काबरे

मो ९९२०१९७६८०

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ श्री रविंद्रनाथ टागोर यांची “गीतांजली”… भाग – ४ ☆ डॉ. शोभना आगाशे ☆

डॉ. शोभना आगाशे

? इंद्रधनुष्य ?

☆ श्री रविंद्रनाथ टागोर यांची “गीतांजली”… भाग – ४ ☆ डॉ. शोभना आगाशे ☆

श्री रविंद्रनाथ टागोर  

गुरूदेव रविंद्रनाथ टागोरांनी जवळजवळ सर्व साहित्य प्रकार हाताळले. त्यांनी कथा लिहिल्या, ज्यातील कांही जगप्रसिद्ध झाल्या. त्यांची अनेक भाषांतून भाषांतरे झाली. दूरदर्शनवर त्या कथा मालिकेच्या स्वरूपात आल्या. त्यांनी अनेक कादंबऱ्या लिहिल्या. त्यातल्या काही चित्रपटाचा साज लेऊन आल्या. त्यांचं बाल साहित्यातील योगदान देखील लक्षणीय आहे. त्यांनी निबंध, आठवणी, टीका, प्रवास वर्णनं, नाटकं व नृत्य नाटिका पण लिहिल्या. अनेक नाटकं, नृत्य नाटिकांचं रंगमंचीय सादरीकरण पण झालं. विशेष म्हणजे या नाटकांचे ते लेखक, कवी, संगीतकार इतकच नाही तर अभिनेता देखील असायचे. पण त्यांच हृदय मात्र कवीचच होतं. त्यांनी कांही दीर्घ काव्यं, खंडकाव्यं (छ. शिवाजी महाराजांवर) पण रचली.

वयाच्या पन्नाशीनंतर त्यांनी चित्रं काढायला सुरुवात केली. मात्र या कलेतील आपलं कौशल्य त्यांनी लवकरच सिद्ध केलं. त्यांच्या चित्रांचं पहिलं प्रदर्शन ‘रविंद्रनाथ – कवी व चित्रकार’ या शीर्षकासह, सन १९३० मधे पॅरिसच्या गॅलरी पिगले (Gallery Pigalle) येथे भरविण्यात आले. यामुळे त्यांच्या कलेला जागतिक ओळख मिळाली. त्यांचं काव्य व चित्रं यांतील नातं इथे सुस्पष्ट होत होतं. नंतर युरोपमध्ये त्यांची अनेक यशस्वी प्रदर्शने भरवली गेली. त्यांची चित्रे साधेपणा, सुस्पष्ट रूपे व लयबद्धता यासाठी ओळखली जात. कालांतराने त्यांच्या १५० व्या जन्मदिवसाच्या औचित्य साधून लंडनमधील ‘व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट’ संग्रहालयाने टागोरांची ५० चित्रे प्रदर्शित केली होती.

टागोरांच्या साहित्याचा अभ्यास, जगातील व भारतातील अनेक विद्यापीठात आज १०० वर्षांनंतरही केला जात आहे. याबाबतीत त्यांची तुलना कालीदास, शेक्सपिअर यांच्याशी केली जाऊ शकते.

गीतांजलीतील अध्यात्म, जगन्नियंत्याची संकल्पना ही उपनिषदांवरून प्रेरित असावी. त्यामुळेच ती कालातीत आहे व देशाच्या, धर्माच्या सीमा ओलांडून ती वाचकांच्या हृदयाला भिडते. आणि त्यामुळेच हे साहित्य अजरामर असं वैश्विक साहित्य झालं आहे. ब्रिटिश युनिटेरियन ‘हिमन्स फॉर लिव्हिंग’ मधील “नाऊ आय रिकॉल माय चाइल्ड” हे स्तोत्र गीतांजलीतील गीत क्र. ९७ वर बेतलेले आहे. यावरून या साहित्याची वैश्विकता सिध्द होत नाही काय?

—–

☆ गीत:- १९ ☆

If thou speakest not I will fill my heart with thy silence and endure it. I will keep still and wait like the night with starry vigil and it’s head bent low with patience.

The morning will surely come, the darkness will vanish, and thy voice pour down in golden streams breaking through the sky.

Then thy words will take wing in songs from everyone of my birds’ nests, and thy melodies will break forth in flowers in all my forest groves.

—–

☆ मराठी भावानुवाद : गीत:– १९ ☆

*

ऐकून माझ्या हृदीची साद

कां न देतसी तू प्रतिसाद?

*
अंतरी भरुनी तुझे मुकेपण

सोसत जाईन हे एकलपण

*
अवसेच्या घन तिमिरातला

साहत राहीन तुझा अबोला

*
चांदण्यांत जशी अवसरात्र

मिटून घेते गात्र न् गात्र

*
तसाच मीही मिटून जाईन

नव्या उषेची वाट पाहीन

*
सुवर्ण रविकिरणांवरुनि

दूत तुझे येतील उतरुनि

*
तव शब्दांचे पंख लेऊनि

उपवनातील फुले फुलवुनि

*
पाखरे मज संदेश देऊनि

गाणी सुस्वर जाती गाऊनि

*
आश्वासक तव बोल यातुनि

उतरतील नभीच्या तमातुनि

*
प्रभात पसरील तिची रक्तिमा

क्षणात वितळुनि रातीच्या तमा

*
तोवर मी पाहीन वाटुली

तोवर मी पाहीन वाटुली

*

भावानुवाद ©️ शोभना आगाशे

संपर्क: ९८५०२२८६५८

—–

☆ गीत: २० ☆

On the day when the lotus bloomed alas, my mind was straying, and I knew it not. My basket was empty and the flower remained unheeded.

Only now and again a sadness fell upon me, and I started up from my dream and felt a sweet trace of a strange fragrance in the South wind.

That vague sweetness made my heart ache with longing and it seemed to me that it was the eager breath of the summer seeking for its completion.

I knew not then that it was so near, that it was mine, and that the perfect sweetness had blossomed in the depth of my own heart.

—–

☆ मराठी भावानुवाद : गीत: २० ☆

*

तुझ्या कृपेचे कमळ उमलले

मज मूढाला नाही कळले

परडी माझी रिक्त फुलांची

कमळ माझिया दृष्टी न पडले॥

*
पुनःश्च उतरले ढग दुःखाचे

सावरले मग मी घर स्वप्नांचे

जिथे सुगंधी दक्षिण वारा

दूत पाठवी मधुगंधाचे ॥

*
उत्सुक, आतुर वसंतवारे

शोधित होते गोडी सारे

ती तर माझ्या अंतर्यामी

तुझ्या कृपेने घडले सारे॥

*

भावानुवाद ©️ शोभना आगाशे

संपर्क: ९८५०२२८६५८

—–

☆ गीत: २१ ☆

I must launch out my boat. The languid hours pass by on the shore—– Alas for me!

The spring has done it’s flowering and taken leave. And now with the burden of faded futile flowers I wait and linger.

The waves have become clamorous, and upon the bank in the shady lane the yellow leaves flutter and fall.

What emptiness do you gaze upon! Do you not feel a thrill passing through the air with the notes of the far awaysong floating from the other shore?

—–

☆ मराठी भावानुवाद : गीत: २१ ☆

*

नाव सोडतो अता प्रवाही,

विश्रांतीचा काळ संपला

वसंत ऋतु ही आला, गेला

फुलांफुलांतुन तो मोहरला॥

*
दाह ग्रीष्म दे त्या पुष्पांना

व्यर्थच जीवन, गळत भूवरी

भार घेऊनि मम हृदयावरी

रेंगाळत मी इथे किनारी॥

*
आज नदीच्या काठावरती

लाटा उसळत अन् घोंघावत

सुकली पाने उडुनि पसरत

पहात मी हे, नजर शून्यवत्॥

*

पैलथडीच्या संगीत लहरी

खुणाविती मज अष्टौप्रहरी

तव भेटीस्तव अधीर अंतरी

प्रवास अंतिम अता सुरु करी॥

– क्रमशः भाग सातवा 

*

मूळ इंग्लिश काव्य : श्री. रविंद्रनाथ टागोर.

भावानुवाद : कवयित्री : © शोभना आगाशे

सांगली 

दूरभाष क्र. ९८५०२२८६५८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ यशाची यशस्विता… लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆

श्री अमोल अनंत केळकर

? इंद्रधनुष्य ?

☆ यशाची यशस्विता… लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर

— श्री. जयंत साळगावकर

यशाची यशस्विता :::: 

काही वर्षापूर्वी एक माणूस खाकी अर्धी चड्डी घालून मुंबई सेंट्रलच्या डेपोमध्ये गाडीतून उतरला. मालवणहून मुंबईत तो पहिल्यांदाच आलेला असतो..

उतरताच मुंबईने त्याला आपला रंग दाखवला, त्याची पिशवी चोरीला जाते. आता करायचे काय ह्या मायानगरीत?  असा प्रश्न त्याच्या मनात आला..

मुंबईत एकमेव माणूस ओळखीचा माणूस आणि आधार तो म्हणजे गंगाधर. खिश्यात पैसा नाही, मग चालत गंगाधरचे घर गाठले. त्याकाळी दुसर्‍याला आधार देण्याची प्रथा होती. दुसर्‍या दिवशी गंगाधरने त्याला ह. रा. महाजनी (लोकसत्ता दैनिकचे संपादक आणि अभिनेता रविंद्रचे वडील)च्या पुढ्यात उभे केले, कारण त्याला नोकरीची गरज होती. या अर्धचड्डीत उभ्या असलेल्या माणसाला महाजनीने नाव, गाव विचारले आणि ते ऐकताच महाजनी म्हणाले, अरे शब्दकोडे सोडवून पाठवतोस तो तूच का..?

मग आजपासून शब्दकोडे रोज बनवून देणे, हीच तुझी नोकरी. अश्यातर्‍हेने पोटापाण्याचा प्रश्न तर सुटला होता. पुढे वेळ मिळेल तेव्हा, ज्योतिष शास्त्राचा अभ्यास करून त्याने नाव कमावले आणि त्यामुळे त्याची ओळख महाराष्ट्राच्या मान्यवर लोकांबरोबर झाली..

पुढे स्वस्थ न बसता दिनदर्शिका काढली, ती सुरुवातीला दुसर्‍याकडून छापून घेतली, पण नंतर स्वतःची प्रेस काढून, दिनदर्शिका प्रकाशित केली. दिनदर्शिकाचे मागचे पान रिकामे असे, म्हणून त्यावर भविष्य आणि अनेक गृहोपयोगी गोष्टी छापल्या. त्यामुळे दिनदर्शिकेची लोकप्रियता आणि खप खूप वाढला, मग दुसर्‍या भाषेत पण, दिनदर्शिका छापणे सुरू केले. खूप पैसा मिळवल्यावर दादर इथे एक इमारत विकत घेतली. ज्या इमारतीमध्ये आज पारसी लोक त्याचे भाडेकरू आहेत…

ही यशोगाथा आहे मालवणहून आलेल्या एका मराठी तरुणाची, ज्यांचे नाव आहे…

“कालनिर्णयकार.. “

“आदरणीय ज्योतिर्भास्कर जयंत साळगावकर” यांची आणि त्यांना सुरुवातीच्या काळात मदत करणारा तो सद्गृहस्थ गंगाधर म्हणजे “कवि गंगाधर महांबरे”..

एका मराठी माणसाची ही यशोगाथा केवळ प्रेरणा मिळावी म्हणून थोडक्यात सादर…

लेखक : अज्ञात  

प्रस्तुति : श्री अमोल केळकर 

बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

poetrymazi.blogspot.in, kelkaramol.blogspot.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ भारत माता : एक राष्ट्रीय दैवत – भाग -२ – माहिती संग्राहक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆

सौ. मंजुषा सुनीत मुळे

? इंद्रधनुष्य ?

☆ भारत माता : एक राष्ट्रीय दैवत – भाग – २ – माहिती संग्राहक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆

भारत माता : एक राष्ट्रीय दैवत संकल्पना, उगम आणि विकास 

(— या चित्रणामुळे स्वातंत्र्यसैनिकांमध्ये एक प्रकारची धार्मिक जिद्द निर्माण झाली. देशाला परकीय सत्तेच्या जोखडातून मुक्त करणे हे केवळ राजकीय कर्तव्य नसून ते एक धार्मिक पवित्र कार्य आहे, अशी भावना जनमानसात रुजली.) 

इथून पुढे – – 

अबनिंद्रनाथ टागोर

भारत मातेचे दृश्य स्वरूप साहित्य आणि भाषणांमधून निर्माण झालेली भारत मातेची प्रतिमा प्रत्यक्षात चित्राच्या रूपात मांडण्याचे काम १९०५ मध्ये अबनिंद्रनाथ टागोर यांनी केले. बंगालच्या फाळणीविरुद्ध सुरू असलेल्या स्वदेशी चळवळीच्या काळात त्यांनी हे चित्र रेखाटले.

चित्रातील प्रतिकात्मकता – – 

अबनिंद्रनाथांनी रेखाटलेली भारत माता ही एक चतुर्भुज तपस्विनी आहे, जिने भगवी वस्त्रे परिधान केली आहेत. तिच्या चार हातांमध्ये चार महत्त्वाच्या वस्तू आहेत, ज्या भारताच्या संस्कृतीचे आणि समृद्धीचे प्रतिनिधित्व करतात:

 * वेद (हस्तलिखित): हे शिक्षणाचे आणि ज्ञानाचे प्रतीक आहे.

 * तांदळाची लोंबी (धान्य): ही देशाच्या अन्नाचे आणि सुजलाम-सुफलाम भूमीचे प्रतीक आहे.

 * जपमाळ: ही भारताच्या आध्यात्मिक वारशाचे आणि आध्यात्मिक शक्तीचे प्रतीक आहे.

 * पांढरे वस्त्र: हे देशातील कापूस उत्पादन आणि आर्थिक स्वावलंबनाचे प्रतीक आहे.

– – भगिनी निवेदिता यांनी या चित्राचे भरभरून कौतुक केले. त्यांच्या मते, हे चित्र राष्ट्रवादाला मानवी रूप देण्याचा एक उत्कृष्ट प्रयत्न होता. भारत माता ही केवळ जमिनीचा तुकडा नसून ती आपल्या मुलांना ‘शिक्षा, दीक्षा, अन्न आणि वस्त्र’ देणारी एक साक्षात देवता आहे, हे या चित्रातून स्पष्ट झाले.

भारत मातेची मंदिरे : राष्ट्रभक्तीचे तीर्थस्थान

भारत मातेची संकल्पना केवळ चित्रात किंवा साहित्यात मर्यादित राहिली नाही, तर तिला प्रत्यक्ष मंदिरांचे स्वरूप देऊन एक सार्वजनिक धार्मिक श्रद्धास्थान बनवण्यात आले.

वाराणसीचे भारत माता मंदिर (१९३६)

भारतातील पहिले ‘भारत माता मंदिर’ वाराणसी येथे महात्मा गांधी काशी विद्यापीठाच्या आवारात उभारण्यात आले. शिवप्रसाद गुप्ता यांनी हे मंदिर बांधले आणि १९३६ मध्ये महात्मा गांधींच्या हस्ते त्याचे उद्घाटन झाले. या मंदिराचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे येथे कोणत्याही देवाची मूर्ती नसून जमिनीवर संगमरवरात कोरलेला भारताचा अखंड नकाशा आहे.

– – गांधीजींनी उद्घाटनावेळी म्हटले की, “हे मंदिर सर्व जाती, धर्म आणि पंथांच्या लोकांसाठी एका वैश्विक व्यासपीठाप्रमाणे काम करेल आणि देशात धार्मिक एकता, शांतता आणि प्रेम वाढवण्यासाठी मदत करेल”. या मंदिरात मैथिलीशरण गुप्त यांची कविता भिंतीवर कोरलेली आहे, जी सर्व भारतीयांना एकतेचा संदेश देते.

हरिद्वारचे भारत माता मंदिर (१९८३)

स्वामी सत्यमित्रानंद यांनी हरिद्वार येथे गंगा नदीच्या काठी ८ मजली भारत माता मंदिर उभारले. १९८३ मध्ये इंदिरा गांधींच्या हस्ते याचे उद्घाटन झाले. या मंदिराचा प्रत्येक मजला वेगळ्या विषयाला समर्पित आहे:

 * पहिला मजला: भारत मातेची भव्य मूर्ती.

 * दुसरा मजला (शूर मंदिर): झाशीची राणी, भगतसिंग यांसारख्या स्वातंत्र्यसैनिकांच्या प्रतिमा.

 * तिसरा मजला (मातृ मंदिर): अहिल्याबाई होळकर, मीराबाई यांसारख्या महान महिलांच्या प्रतिमा.

 * चौथा मजला (संत मंदिर): भारताच्या महान संतांच्या प्रतिमा.

– – | भारत माता मंदिर | वाराणसी | १९३६ | महात्मा गांधी (उद्घाटक) | संगमरवरी नकाशा, मूर्ती नाही. |

– – | भारत माता मंदिर | हरिद्वार | १९८३ | इंदिरा गांधी (उद्घाटक) | ८ मजली भव्य इमारत, संतांचे आणि शूरवीरांचे दर्शन. |

– – | जातीय शक्तिपीठ | कोलकाता | २०१५ | केशरी नाथ त्रिपाठी | जगत्तारिणी दुर्गेच्या रूपात भारत मातेची पूजा. |

भगिनी निवेदिता आणि राष्ट्रप्रेमाचा मंत्र

स्वामी विवेकानंदांच्या शिष्या भगिनी निवेदिता यांनी भारत मातेच्या संकल्पनेला प्रचंड गती दिली. त्या स्वतः जपमाळेवर ‘भारतवर्ष’ या मंत्राचा जप करत असत. त्यांच्या मते, भारतीयांनी दररोज संध्याकाळी ‘आम्ही सर्व एक आहोत, आम्हाला कोणीही विभागू शकत नाही’ असा विचार करणे हीच खरी देशपूजा आहे. निवेदिता यांनी अबनिंद्रनाथ टागोरांच्या भारत मातेच्या चित्राचा प्रसार केला आणि भारतीयांच्या मनात आपल्या देशाबद्दल एक प्रकारची ‘भक्ती’ निर्माण केली. “देशासाठी जगणे आणि स्वतःला भारत मातेच्या चरणी अर्पण करणे” हाच त्यांच्या जीवनाचा संदेश होता.

भारत माता की जय : वाद आणि संवाद

‘भारत माता की जय’ ही घोषणा भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात आणि आजही अत्यंत लोकप्रिय आहे. मात्र, अलीकडच्या काळात यावरून काही राजकीय आणि सामाजिक वाद निर्माण झाले आहेत. काही समुदायांचे म्हणणे आहे की, त्यांच्या धर्मात ईश्वराव्यतिरिक्त इतर कोणत्याही मानवी रूपाची किंवा प्रतिमेची पूजा करण्यास मनाई आहे.

तथापि, अनेक विचारवंतांच्या मते ‘भारत माता’ हे केवळ धार्मिक प्रतीक नसून ते एक सांस्कृतिक आणि राष्ट्रीय प्रतीक आहे. ज्याप्रमाणे आपण आपल्या जन्मदात्री मातेला मान देतो, त्याचप्रमाणे ज्या भूमीवर आपण लहानाचे मोठे झालो, तिच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे म्हणजे ‘भारत माता की जय’ म्हणणे होय. भारतीय सैन्यात देखील या घोषणेचा वापर शौर्य आणि अभिमानाचे प्रतीक म्हणून केला जातो.

विनायक दामोदर सावरकर आणि भारत माता

स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी देखील भारत मातेच्या संकल्पनेला अत्यंत प्रखर राष्ट्रवादाची जोड दिली. सावरकरांच्या मते, ही भूमी केवळ आपली पितृभूमी (वडिलोपार्जित जमीन) नसून ती आपली पुण्यभूमी (पवित्र जमीन) देखील आहे. त्यांनी आपल्या अनेक कवितांमधून आणि भाषणांमधून भारत मातेला दैवताचे स्थान देऊन तिच्या मुक्तीसाठी प्राणांचे बलिदान देण्याचे आवाहन तरुणांना केले. सावरकरांच्या राष्ट्रवादात भारत माता ही एक जिंतंत, चैतन्यमयी शक्ती होती, जिच्या संरक्षणासाठी सशस्त्र क्रांतीचा मार्गही समर्थनीय होता.

एक शाश्वत प्रेरणा – – 

“भारत माता हेच दैवत” असे पहिल्यांदा किरण चंद्र बॅनर्जी यांनी आपल्या नाटकाद्वारे मांडले असले, तरी या विचाराला जनचळवळीचे आणि आध्यात्मिक क्रांतीचे रूप स्वामी विवेकानंदांनी दिले. १८७३ पासून सुरू झालेला हा प्रवास आजही तितकाच जिवंत आहे. भारत माता ही केवळ एक भौगोलिक संकल्पना नसून, ती कोट्यवधी भारतीयांच्या अस्मितेचे, श्रद्धेचे आणि बलिदानाचे प्रतीक आहे.

– – विवेकानंदांनी सांगितलेली ती ‘पन्नास वर्षे’ संपून आता काळ पुढे निघून गेला असला, तरी आजही भारतापुढील आव्हाने पाहता त्यांच्या विचारांची गरज संपलेली नाही. “स्वदेशासाठी सेवा हीच खरी ईश्वरसेवा” हा मंत्र जोपर्यंत भारतीयांच्या मनात जिवंत आहे, तोपर्यंत भारत माता हे दैवत भारतीयांना प्रगतीच्या आणि एकतेच्या मार्गावर मार्गदर्शन करत राहील.

 समाप्त –

माहिती संग्राहक : अज्ञात 

प्रस्तुती : सौ. मंजुषा सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares