मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ मैना खेर… अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुहास सोहोनी ☆

श्री सुहास सोहोनी

? मनमंजुषेतून ?

☆ मैना खेर… अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुहास सोहोनी ☆

(महिना अखेर)

आमच्या लहानपणी मैना खेरने स्वत:चा असा दबदबा निर्माण केलेला होता. आम्हा भावंडांच्या कोणत्याही मागणीला आई बाबांचं एकच उत्तर यायचं, ” शू:$$, आता नाही हं! मैना खेर आहे.”

मग हळूहळू समजायला लागलं की, बाबांच्या पगाराच्या आधीच या मैना खेर मॅडम येतात. त्या फार कडक आहेत. त्या असल्या की पापडसुद्धा तळायची  परवानगी आईला नसते. मग भजी, वडे यांची बातच सोडा. कोणतंही वाणसामान आणायची मुभा नसते. अगदी खेळताना पडलो, धडपडलो तरी आईला आमच्या पडण्यापेक्षा मैना खेर असताना आम्ही का पडलो, याचंच दु:ख व्हायचं.

बाकी मैना खेर आहे म्हणून शाळा लवकर सुटण्याचं सुखही मिळायचं म्हणा.

मैना खेर आणि रद्दी, भंगारवाला यांचंही काहीतरी कनेक्शन होतं. हे लोक हमखास यावेळी चाळीत हजेरी लावायचे. घरोघरच्या होम मिनिस्टर कसोशीनं व्यवहार करायच्या. अगदी दहा-वीस पैसे मिळाले तरी केवढा आनंद झळकायचा त्यांच्या चेहऱ्यावर! 

महिन्याचा शेवटचा आठवडा हा मैना खेरबाईंच्या दहशतीचा असायचा.

कालांतराने पगाराची पेमेंटस् झाली. एक तारखेचा मुहूर्तही पेमेंटसाठी उरला नाही. घरातल्या चार माणसांचे पैसे महिन्याच्या वेगवेगळ्या आठवड्यात मिळायला लागले आणि मैनाबाई म्हाताऱ्या झाल्या.

व्यावसायिकांना तर त्यांचं काहीच वाटेनासं झालं.

माझ्या एका व्यावसायिक मित्राच्या यशाचा आनंद साजरा करायला आम्ही कुटुंबिय हाॅटेलमधे निघालो, ती तारीख सव्वीस होती. योगायोगाने माझी वृद्ध आई माझ्याकडे आलेली होती. तिलाही मी तयार व्हायला सांगितलं तर,

“अगं,काय ही उधळमाधळ? मैनाखेर असताना?” असं ती दहादा तरी कुरकुरली. असो.

आम्ही नाही तरी कोणी तरी आपल्याला अजून वचकून आहे या विचारानं मैनाबाईही गहिवरल्या असतील नक्कीच !!

या निमित्त काळाच्या ओघात अगदीच विस्मरणात गेलेल्या मैना खेरबाईंच्या आठवणी जागवल्या गेल्या. या बाई आपल्यातून केंव्हा निघून गेल्या हे कळलेच नाही. गेल्या काही दशकातील झालेल्या अनेक बऱ्यावाईट उलथापालथींपैकी ही एक घटना. 

बहुधा आजच्या तरुण मुलामुलींना या मैना खेरबाई भेटल्याही नसाव्यात किंवा दिवाळीला केले जाणारे फराळाचे पदार्थ, दिवाळीच्याच मुहूर्तावर केले जात होते, घरच्या सर्वांना वर्षातून एकदाच नवे कपडे घेतले जात होते, या गोष्टीची जाणीवसुद्धा होत नसेल.

लेखक – अज्ञात. 

प्रस्तुती : सुहास सोहोनी. 

मो ९४०३०९८११०

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆– अपूर्व योग… – ☆ सुश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर ☆

सुश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर

? मनमंजुषेतून ?

☆ – अपूर्व योग… – ☆ सुश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर ☆

(गानयोगिनी धोंडूताई कुलकर्णी)

१ जून…..  शास्त्रीय संगीतातील विदुषी श्रीमती धोंडूताई कुलकर्णी यांचा स्मृतिदिन. त्यांची एक सुरम्य आठवण …… 

१८ ऑगस्ट २००० चा दिवस. टीव्हीवरील एका मराठी मालिकेचं छानसं गाणं मी मुंबई विद्यापीठाच्या ‘क्लबहाऊस’ या रेकॉर्डिंग स्टुडिओत रेकॉर्ड करत होते. इतक्यात तिथं एक ओळखीचा चेहरा समोर दिसला. ओळखीची खूण पटली. तरी नेहमीप्रमाणे नक्की नाव काय, ते आठवेना. बाई ठेंगणी ठुसकी, गोल चेहरा, गोल मोठं कुंकू. कुठं पाहिलंय बरं? नेहमीचंच कोडं ! पण आदरणीय किशोरीताईंच्या सोबत कुठं तरी नातं जुळतंय, एवढा मात्र धागा लागला. रेकॉर्डिंगचं मनावरचं दडपण अधिकच वाढलं. बाई समोरच्या रूममध्ये, खाली बसल्यानं, त्यांच्या चेहऱ्यावरील भाव मला नंतर दिसेना. परंतु अस्तित्व जाणवत असल्याने आता मात्र लक्षपूर्वक, जाणीवपूर्वक उत्तमच गायचं, अशी मनाशी खूणगाठ बांधून एका टेकमध्ये गाणं ओके करून, मी रेकॉर्डिस्टच्या रूममध्ये आले. गाणं कसं झालं असेल? या कुतूहलमिश्रित तणावामध्ये मी त्या खोलीत प्रवेश केला.  रेकार्डिस्टसह निर्माता, दिग्दर्शक, सर्वजण खुशीत दिसत होते. 

त्या बाईंनी अगदी आनंदानं माझं स्वागत केलं, अन् म्हणाल्या, “अगं, आज तुला अगदी आनंदाची बातमी द्यायची आहे. काय देशील तू मला? ” मीही अगदी थाटात म्हटलं, “ तुम्हाला जे आवडेल ते ! ” मीही त्यांचा हात हातात धरून त्यांचं नाव आठवायचा प्रयत्न करत होते.. त्या म्हणाल्या, “ संगीत क्षेत्रातल्या दिग्गज विदुषी, धोंडूताई कुलकर्णी यांनी मला परवाच सांगितलं, की ‘अगं शिल्पा, मला नं, त्या पद्मजा फेणाणी जोगळेकरचं गाणं अत्यंत मनापासून आवडतं.’ धोंडूताई कधी कुणाचं असं कौतुक करीत नाहीत. पण अगदी मनापासून त्या मला सांगत होत्या की, “आजच्या पिढीतली ‘पद्मजा’ म्हणजे माझी सर्वात आवडती गायिका ! तिला मी तानपुऱ्यावर केदार रागातली बंदिश  गाताना एन.सी.पी.ए.मध्ये प्रत्यक्ष ऐकलंय. काय तिचा आवाज, किती गोड नि लवचिक ! अगदी पाण्यासारखा सरसर वळतो. मला खूपच आवडते ती ! ‘ 

…. “पद्मजा तू त्यांना एकदा भेटून नमस्कार करून ये बरं…” 

हे सारं मुंबई विद्यापीठाच्या प्राध्यापक श्रीमती शिल्पा तेंडुलकर यांच्याकडून ऐकून तर मी गारच पडले ! धोंडूताई म्हणजे शास्त्रीय संगीतातील विशुद्ध शास्त्राचा परिपाक ! आणि त्यांनी माझ्याविषयी हे उद्गार काढावेत! सहसा, शास्त्रीय संगीतातील कलाकार इतर गायकांना कौतुकाच्या बाबतीत जरा दूरच ठेवतात. परंतु धोंडूताईंनी माझ्या शास्त्रीय गायनाचं मनापासून केलेलं कौतुक ऐकून, मला धन्य धन्य वाटलं ! त्या रात्री परमेश्वराचे, आईवडिलांचे व गुरूंचे आभार मानत मी एका वेगळ्याच तरल आनंदात झोपी गेले….!

©  सुश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ओंजळ… ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

??

☆ ओंजळ… ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

रोज सकाळी उठताना ‘कराग्रे वसते लक्ष्मी करमध्ये सरस्वती….’ ‘म्हणत दोन्ही हाताची ओंजळ सर्वप्रथम डोळ्यासमोर येते आणि ‘प्रभाते कर दर्शनम्’….’ म्हणत रोजचा दिवस दाखवणाऱ्या परमेश्वराला त्याच हाताने आपण नमस्कार करतो !

‘ओंजळ’ म्हटली की डोळ्यासमोर येतो तो कर्ण ! सकाळच्या वेळी गंगेच्या पाण्यात उभा राहून सूर्याला अर्घ्य देताना केलेल्या ओंजळीतून पाणी देत असलेला ! दानशूर कर्णाची ओंजळ कधी रीती रहा ]त नव्हती.  गंगा स्नानानंतर तो हा दानयज्ञ ओंजळीने करीत असे !  दानशूर कर्णाची भरली ओंजळ ज्याला जे पाहिजे ते देण्यात व्यस्त असे ! त्यामुळे कर्णाकडून कोणाला काही पाहिजे असेल तर ते सूर्योदयाला दानाच्या वेळी त्याला भेटले तर मिळत असे. इंद्राने त्याची कवच कुंडले ही अशाचवेळी मिळवली. 

‘ओंजळ’ हे दातृत्वाचे प्रतीकच आहे जणू ! दोन्ही हातांचे तळवे एकमेकांना जुळवून ओंजळ तयार होते. तहानलेल्या माणसाला ओंजळीत पाणी ओतत असताना प्यायले की पोटभर पाणी प्याल्यासारखे वाटते, तसेच ओंजळभर धान्य एखाद्याच्या झोळीत टाकले की झोळी भरल्यासारखी होते. ओंजळ ही नेहमी भरलेली असावी. दानासाठी आपण हाताचे महत्त्व सांगतो, तसेच ओंजळ ही नेहमी दोन हाताने काही देण्यासाठीच असते !

फुलांनी भरलेली हाताची ओंजळ डोळ्यासमोर आली की मन प्रसन्न होते. सकाळच्या वेळी जर कोणी सुवासिक जाई, जुई, मोगरा, बकुळी यासारखी फुले ओंजळ भरून दिली तर अगदी श्रीमंत असल्यासारखेच वाटते मला ! त्या फुलांचा वास भरभरून मनाच्या गाभाऱ्यापर्यंत पोहोचतो आणि तीच फुले देवाच्या देव्हाऱ्यात सजलेली पाहताना ते फुलांनी सजवलेले परमेश्वराचे रूप पाहून मन भरून येते ! 

ओंजळ हे छोटेसे प्रतीक आहे जीवनाचे ! आकाशात भरून आलेला पाऊस हत्तीच्या सोंडेने जरी धरतीवर कोसळत असला तरी त्या धारेची साठवण आपण हाताच्या ओंजळीत करतो तेव्हा ती सीमित असते. ओंजळ आपल्याला तृप्त राहायला शिकवते असे मला वाटते !….. भुकेच्या वेळी मिळालेले ओंजळभर अन्न  किंवा तृषार्त असताना मिळालेले ओंजळभर पाणी याचे महत्त्व माणसाला खूपच असते. अशावेळी तृप्तीचे आसू आणि हसू आल्याशिवाय रहात नाही. जे मिळते ते समाधानाने घ्यावे, त्यातच जीवनाचे सार सामावलेले असते ! 

ओंजळ भरून लाह्या जेव्हा पती-पत्नी लाजा- होमात घालत असतात तेव्हा हीच त्यागाची भावना एकमेकांसाठी मनात भरून घेतात ! जीवनाच्या वेदीवर पाऊल टाकताना नवरा- बायको लाह्यांची ओंजळ समर्पण करून एकमेकासाठी आपण आयुष्यभरासाठी जोडलेले आहोत ही जाणीव एकमेकांना देत असतात., तर कन्यादानाच्या वेळी मुलीचे आई-वडील आणि नववधू- वर हाताच्या ओंजळीत पाणी घेतात, जणू आई-वडिलांकडून कन्येचे दान या ओंजळीतून होत असते !

‘ओंजळभर धान्य ‘ या संकल्पनेतून घराघरातून धान्य जमा करून एका सेवाभावी संस्थेत देत असलेले ऐकले आहे. त्याठिकाणी प्रत्येक घरातून आलेल्या ओंजळभर धान्याचे रूपांतर एका खूप मोठ्या धान्यासाठ्यात होते. देणाऱ्यांना एक ओंजळभर धान्य देताना फारसा त्रास वाटत नाही, पण अशा असंख्य ओंजळीच्या एकत्रीकरणातून नकळत खूप मोठी समाजसेवा घडत असते… गोंदवलेकर महाराज म्हणत असत की दारी आलेल्या भुकेल्या माणसाला कधी हाकलून देऊ नये. फार तर त्यांना पैसे देऊ नयेत पण ओंजळभर धान्याची भिक्षा द्यावी. त्याकाळी अन्नदानाचे पुण्य मोठे वाटत असे आणि त्या अन्नाचा आशीर्वाद संपूर्ण कुटुंबाला मिळत असे.

आपण लक्ष्मीचे चित्र बघतो तेव्हा ती ओंजळीने नाणी ओतत असते आणि तिची ओंजळ सतत भरभरून वाहत असते ! अशा लक्ष्मीची कृपा आपल्यावर सतत राहू दे असंच मनात येते. लक्ष्मीपूजनाला आपण अशा लक्ष्मीची पूजा करतो. 

आत्ता सहज आठवली ती व्ही. शांताराम यांच्या चित्रपटात सुरुवातीला दाखवली जाणारी कमनीय स्त्री, जी ओंजळीतून फुले उधळीत असते.  त्या कमनीय  देहाचे सौंदर्य त्या ओतणाऱ्या ओंजळीतून इतके प्रमाणबद्ध रेखाटले आहे की, ते चित्र आपल्या सर्वांच्या मन: पटलावर कोरले गेले आहे !

आपल्या दोन हातावरील रेषा आपले भविष्य दाखवतात असे आपण म्हणतो. जेव्हा ते दोन हात एकत्र येतात आणि जी ओंजळ बनते ती आपल्याला काम करण्यास प्रवृत्त करते. अशी ही ‘ओंजळ’ शब्दबद्ध करताना माझी शब्दांची ओंजळ अपुरी पडते असे मला वाटते ! पण भावपूर्ण शब्दांच्या या ओंजळीला सतत ओतत राहण्यासाठी सरस्वती मला साथ देऊ दे, असंच या छोट्या ओंजळीसाठी  मला वाटते !

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “विठ्ठल ! विठ्ठल !” ☆ श्री कौस्तुभ केळकर नगरवाला ☆

? मनमंजुषेतून ?

☆ विठ्ठल ! विठ्ठल !☆ श्री कौस्तुभ केळकर नगरवाला ☆

विठोबा. मला मनापासून आवडतो.अगदी लहान असल्यापासनं. कमरेवर हात ठेवून उभा ठाकलेला.. .गालातल्या गालात खुदकन् हसणारा. काळासावळा.साधासुधा. आपला देव वाटतो.

पंढरपूरला गेलो की सहज भेटायचा. आपुलकीनं बोलणार. ‘ काय, कसा काय झाला प्रवास ? यावेळी अधिकात येणं झालं. जरा गर्दी आहे. चालायचंच. सगळी आपलीच तर माणसं. असं करा.उद्या सक्काळी सक्काळी या. काकडआरतीला. मग निवांत बोलू.’ मला पटायचं. 

दुसऱ्या दिवशी भल्या पहाटे पाचच्या सुमारास मी एकटाच मंदिरात जायचो. फारशी गर्दी नसायचीच. विठोबा निवांत भेटायचा. वेगळ्याच दुनियेत गेल्यासारखं वाटायचं. काकडआरती चाललेली. धूप उदबत्तीचा  सुगंध. सगळं अदभुत. एवढ्या गर्दीतसुद्धा विठोबा माझ्याकडेच बघायचा. डोळ्यातल्या डोळ्यात हसायचा. “अरे वा ! आज सकाळी सकाळी दर्शन. वा ! वा! आनंद वाटला. काय कसा काय चाललाय अभ्यास ? तेवढं गणिताकडे लक्ष द्या. पुढच्या वेळी याल तेव्हा पाढे पाठ पाहिजेत हं तीसपर्यंत. जरा लिहायची सवय ठेवा. आम्ही पाठीशी आहोतच.तरीही तुम्ही मेहनतीत कमी पडता कामा नये. बाकी अक्षर छान आहे हो तुमचं…”

मला भारी वाटायचं. “तीसपर्यंत पाढे नक्की पाठ करतो. गाॅडप्राॅमीस.” मी गाॅडप्राॅमीस म्हणलं की विठोबा गालातल्या गालात गोड हसायचा. “बरं बरं..”

देवाशपथ सांगतो. लहान असताना विठोबाशी असं सहज चॅटींग व्हायचं. माझे आजी आजोबा. पालघरला  रहायचे. दरवर्षी दोघंही वारीला जायचे. चातुर्मासात चार महिने पंढरपूरला जाऊन रहायचे. दरवर्षी आम्हीही जायचो पंढरपूरला. साधारण 80 ते 85 चा सुमार असेल. चार पाच वर्ष सलग जाणं झालं पंढरपूरला. तेव्हा महापूजा असायच्या. आजोबांच्या पंढरपूरात ओळखी फार. माझे दोन्ही मामा मामी, आई बाबा सगळ्यांना महापूजेचा मान मिळाला. गाभाऱ्यातला विठोबा आणखीनच जवळचा झाला. हिरव्याकाळ्या तुळशीची माळ काय छान शोभून दिसायची विठोबाला. त्याच्या कपाळावरचं ते गंध. दूध दह्यानं घातलेली आंघोळ. विठोबाच्या चेहऱ्यावरील अलौकिक तेज. त्याचे ते अलंकार. लगोलग हात जोडले जायचे. असं वाटायचं पूजा संपूच नये कधी….

पंढरपूरला आजी आजोबा बांगड धर्मशाळेत रहायचे. धर्मशाळा नावालाच. अतिशय उत्तम सोय. सेल्फ कंटेन्ड रूम्स. भल्यामोठ्या. दोन खोल्यात आजीआजोबांचा संसार मांडलेला असायचा. गॅसपासून सगळी सोय. आम्ही गेलो की दोन खोल्या अजून मिळायच्या. प्रत्येक खोलीसमोर रूमएवढीच भलीमोठी गॅलरी. तीन चार मजली मोठी इमारत. नवीनच बांधलेली. अतिशय लख्ख स्वच्छ. धुडगूस घालायला पुरेपूर स्कोप. समोरचा वाहता रस्ता. गॅलरीत रेलिंगला टेकून रस्त्यावरची गंमत बघायला मला जाम आवडायचं. ही जागा मंदिरापासून पाच मिनिटांच्या अंतरावर. पंढरपूरला गेलो की दोन दिवस रहाणं व्हायचंच व्हायचं. सकाळी महापूजा आवरली की दिवस मोकळा. मी चौथी पाचवीत असेन तेव्हा.

सक्काळी सक्काळी जाग यायची. लाऊडस्पीकरवर भीमसेन आण्णांचा आवाज कानी पडायचा. “माझे माहेर पंढरी…”. आपण युगानुयुगे पंढरपूरला रहातोय इतकं प्रसन्न वाटायचं. सगळं आवरून मी शून्य मिनिटात तयार व्हायचो. मग आजोबांबरोबर चंद्रभागेतीरी. बोटीत बसायला मिळावं ही प्रामाणिक इच्छा. मी पडलो नगरवाला. पाऊस, पाणी, नदी, बोटींग या गोष्टी परग्रहावरल्या वाटायच्या. नदी पाण्यानं टम्म फुगलेली. माझी बोटींगची इच्छा विठोबा, थ्रू आजोबा सहज पूर्ण करायचा. चूळूक चूळूक आवाज , ओल्या पाण्याचा हवाहवासा वास, घाटांवर विसावलेली असंख्य कळसांच्या भाऊगर्दीत हरवलेली पंढरी. अलंकापुरी. हे स्वर्गसुख बघायला दोन डोळे पुरायचे नाहीत. 

चंद्रभागेला भेटून पुन्हा बांगड धर्मशाळेत परतायचं. तोवर आजीचा स्वयंपाक झालेला असायचा. जेवण झालं की मी पुन्हा गुल. तेव्हाही पंढरपूरात गर्दी असायचीच. तरीही आजच्याइतकी नाही. भलीमोठी दर्शनरांग, दर्शनमंडप वगैरे नसायचं. दिवसातून ईन्फाईनाईट टाईम्स मी मंदिरात जायचो. दहा पंधरा मिनिटात सहज दर्शन व्हायचं. विठोबाशी मैत्र जुळायचं. कंटाळा आला की नामदेवाच्या पायरीपाशी जाऊन बसायचो. 

मला आठवतंय, एके दिवशी सकाळी नामदेवपायरीपाशी गेलेलो. एक वारकरी नाचत होता. हातात चिपळ्या. गळ्यात वीणा आणि तुळशीच्या माळा. कपाळी गंध. कुठलातरी अभंग म्हणत होता. दिवसभरात चार पाच वेळा चकरा झाल्या माझ्या तिथं. प्रत्येक वेळी तो भेटला. भान हरपून नाचणारा. मला रहावलं नाही. सुसाट धर्मशाळेत गेलो. आजीला सगळं सांगितलं. ” सकाळपासून नाचतोय बिचारा. जेवला सुद्धा नाही गं.” आजी खुदकन् हसली. “तोच खरा विठोबा. जा नमस्कार करून ये त्याला.” मी रिवर्स गिअरमधे पुन्हा मंदिरात. त्याला वाकून नमस्कार केला. तो मनापासून हसला. मला कवेत घेतलं. गळ्यातली तुळशीची माळ माझ्या गळ्यात घातली. धन्य. धन्य. काय सांगू राव? त्याच्या डोळ्यात विठोबा हसत होता.

धर्मशाळेत मॅनेजरची खोली होती. विठोबा, ज्ञानेश्वर, तुकाराम आणि इतर अनेक संतांच्या तसबिरी होत्या. वीस पंचवीस असतील. मॅनेजरकडे मोठ्ठी सहाण होती. गंध उगाळायला अर्धा तास सहज लागायचा. मग प्रत्येक तसबिरीला गंध लावणं., जुना हार काढून ताजा हार घालणं, उदबत्ती लावणं. मला हे सगळं बघायला खूप आवडायचं. मॅनेजर माझी परीक्षा घ्यायचे. संतांची मांदियाळी मी बरोबर ओळखायचो. मॅनेजर खूष. बक्षीस म्हणून विठोबाला हार मी घालायचो. बत्तासा मिळायचा. मला भारी वाटायचं.

धर्मशाळेत खालच्या मजल्यावर कुठलेतरी कीर्तनकारबुवा आलेले असायचे. सकाळी त्यांची पूजा आटोपली की रियाज असायचा. मी जाऊन बसायचो. रात्री त्यांचं मंदिरात किर्तन असायचं. साथीदार तयारीचे…  मृदुंगाला शाई लावली जायची. टाळ चिपळ्यांचा आवाज घुमायचा. बुवांची रसाळ  वाणी. प्रेमळ चेहरा. लाईव्ह परफाॅर्मन्स. श्रोता मी एकटाच. कीर्तन मस्त रंगायचं. माझा चेहरा बघून बुवा खूष व्हायचे. सहज शेजारी लक्ष जायचं. वाटायचं विठोबाच शेजारी बसून प्रसन्न चित्ताने कीर्तन ऐकतोय. भारीच.

दुसऱ्या मजल्यावर एक चित्रकार असायचे. संस्थानाच्या कामासाठी आलेले. महाभारत, रामायण, विठोबाची अप्रतिम चित्रं काढायचे. एकदम जिवंत. भल्यामोठ्या कॅन्व्हासवर. मी गुपचूप तिथं जाऊन बसायचो. तासन्तास. हरवून जायचो. मोठा कसबी कलाकार. तासाभरानं त्यांचं माझ्याकडे लक्ष जायचं. मी पटकन् विचारायचो, ” इतकी छान चित्रं कशी काय  काढता ?” ते नुसतेच हसायचे. “मी नाही काढत. विठोबाच रंगवून घेतो माझ्याकडनं.”. झालं. मला कमरेवरचे हात काढून, ब्रश घेवून चित्र रंगवणारा विठोबा दिसू लागायचा. नंतर कळायचं. त्यांनीच काढलेली अप्रतिम चित्रं मंदिरात लावली आहेत. त्यांचं म्हणणं पटायचं.

पंढरपुरातले दोन दिवस शून्य मिनिटात संपून जायचे. दोन दिवसात ईन्फाईनाईट टाईम्स, ईन्फाईनाईट रूपात विठोबा भेटायचा. जड पावलांनी टांग्यात बसायचं. स्टॅन्डवर पोचलो की नगरची गाडी तयारच असायची. टिंग टिंग. डबलबेल. खिडकीतून बाहेर लक्ष जायचं. “या पुन्हा पुढच्यावर्षी…” विठोबा हात हलवून निरोप द्यायचा. डोळ्यात चंद्रभागा दाटून यायची.

नंतर पुन्हा फारसं पंढरपूरला जाणं झालं नाही. आज ठरवून  पासोड्या विठोबाला भेटलो. विठोबा ओळखीचा हसला.

“काय चाललंय ? झाले का पाढे पाठ ?” .मी जीभ चावली.

“बरं…बरं. असू देत.एकदा हेडआॅफीसला जावून या.”

“नक्की…”.मी पंढरपूरचं प्लॅनिंग करायला लागतो.

विठ्ठल ! विठ्ठल…||

©  श्री कौस्तुभ केळकर नगरवाला

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “लेखन…” ☆ श्री सुनील देशपांडे ☆

श्री सुनील देशपांडे

परिचय

शालेय शिक्षण कोयनानगर व महाविद्यालयीन शिक्षण सायन्स कॉलेज कराड

  • अनेक वर्षे वास्तव्य नाशिक सध्या वास्तव्य पुणे (बाणेर).
  • स्वरचित तीन मराठी कविता संग्रह प्रसिद्ध
  • ‘संवाद’ या संस्थेच्या चार स्मरणिकांचे प्रकाशन.
  • ‘संवाद’ च्या चार दिवाळी अंकांचा  उपसंपादक
  • ‘महादान’ या अवयवदाना संबंधीच्या विशेषांकाचे संपादन.
  • अवयवदाना विषयी दोन पुस्तिकांचे लेखन व प्रकाशन.
  • पंघरा वर्षे रोटरीच्या विविध बुलेटिन्सचे संपादन व प्रकाशन.
  • विविध नियतकालिकांमध्ये नैमित्तिक स्फुटलेखन.
  • अवयवदाना संबंधी सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर.
  • फेडरेशन ऑफ ऑर्गन ॲन्ड बॉडी डोनेशन या राज्यस्तरीय संस्थेचा  उपाध्यक्ष.
  • ‘अंगदानकी चार लाईना’ – हा हिंदी चारोळ्यांचा ई-बुक संग्रह प्रकाशनाच्या मार्गावर.
  • स्वत: शब्दांकन केलेली अवयवदान प्रतिज्ञा सरकारमान्य झाली असून ती सर्व अवयवदानाच्या कार्यक्रमात अधिकृत प्रतिज्ञा म्हणून घेतली जाते.
  • माजी अवयवदान विभागीय अध्यक्ष, आंतरराष्ट्रीय रोटरी विभाग क्र ३०३०
  • मृत्युंजय ऑर्गन फाउंडेशन नाशिक या संस्थेचा संचालक
  •  महाराष्ट्र शासनाच्या मानवी अवयव प्रत्यारोपण विभागीय प्राधिकरण समितीचा (Divisional Authorisation Committee) सदस्य.

? मनमंजुषेतून ?

☆ “लेखन…” ☆ श्री सुनील देशपांडे ☆

लेखनाचा किती मोठा प्रवास आमच्या पिढीने अनुभवला तसा क्वचितच दुसऱ्या कोणत्या पिढीने अनुभवला असेल.  लहानपणी मला आठवते चौथीपर्यंत आम्हाला पाटी-पेन्सिल होती.  चौथीला पहिल्यांदा वही आणि शिसपेन्सिल आली.  पेन नव्हतंच.  पण पाचवीपासून सुरू झाली टाक-दौत. दौत हातामध्ये घेऊन जायची.  शाळेच्या बाजूला दुकानात जायचं, त्या दुकानातून शाईची पुडी विकत घेऊन यायची.  त्या दौत नामक बाटलीमध्ये नळाचे पाणी भरायचं.  त्या पाण्यामध्ये शाईची पुडी टाकायची.  हे टाकत असताना हात निळेजांभळे व्हायचे.  

बऱ्याच वेळेला कुणाचा तरी पाय लागून कुणाची तरी दौत सांडायची किंवा लाथाडली जायची.  या लाथाडलेल्या दौतीचा प्रसाद अनेकांना मिळायचा. त्या वेळेला बाक नव्हतेच.  तेव्हा बस्करं तरी असायची, नाहीतर पाट तरी असायचे. त्यावर बसून टाक आणि दौत यांचा वापर करुन वहीत लिहिणे हा एक वेगळाच थ्रिलिंग अनुभव. संध्याकाळी घरी आल्यावर सगळे हात निळेजांभळे झालेले. बऱ्याच जणांचे शर्ट-पॅंट वर निळेजांभळे डाग पडलेले.  पायाचे गुडघे निळेजांभळे झालेले. दप्तरं तर सगळ्यांचीच निळ्या जांभळ्या डागांनी भरलेली असायची. आईला अत्यंत त्रासदायक ठरणाऱ्या अशा अवतारात आम्ही घरी पोहोचायचो.  बऱ्याच वेळेला बाबांचा मारही खायचो. त्या वेळेला कपडे धुण्यासाठी आईला जो त्रास व्हायचा त्याची आम्हाला तेंव्हा फारशी कल्पना नसायची.  त्यावेळेला साबण म्हणजे 501 नावाचा बार.  तो सगळ्यात चांगला साबण समजला जायचा.  त्या बाराचा एक तुकडा घेऊन कपडे घासायचे आणि शक्यतो ते निळेजांभळे डाग पुसट पुसट करण्याचा प्रयत्न आई करत असे.  

सहसा निळ्या जांभळ्या डागांचे हे युनिफॉर्म घातलेला बहुदा प्रत्येक जणच असायचा.  शाईच्या डागांचं सगळ्यात मोठं कर्तृत्व शर्ट पॅन्टवर वागवत आम्ही पाचवी सहावी सातवी या तीन वर्षांचा प्रवास केला.  त्यानंतर आठवीमध्ये दाखल झाल्यावर पहिल्यांदा आमच्या हातात पेन आलं. अर्थात ते पेन म्हणजे शाईचं पेन.  त्या पेनमध्ये शाई भरणे हा एक प्रचंड मोठा सोहळा असायचा. अर्थात त्यालाही दौत असायचीच.  फक्त टाकाबरोबर सतत बाळगायला लागयची नाही,  त्या ऐवजी दिवसातून एकदा कधीतरी त्या पेनमध्ये शाई भरायला लागायची. आणि आमचे हात पुन्हा निळेजांभळे व्हायचेच. अर्थात एकदा पेनमध्ये शाई भरल्यानंतर पुन्हा सतत निळेजांभळे हात करावे लागायचे नाहीत.  परंतु कुणीतरी खोडी काढायची म्हणून किंवा कुणीतरी गंमत म्हणून किंवा भांडणाचा सूड उगवायचा म्हणून पाठीवर पेन झटकलेले असायचे. ते पाठीवरचे निळेजांभळे डाग हे घरी आल्यावर आईने धपाटा घातल्यावरच आम्हाला दिसायचे.  त्यानंतर अकरावीपर्यंत म्हणजेच एस एस सी पर्यंत शाईची पेनं वापरली. 

कॉलेजला आल्यावर मग बॉलपेनं सुरू झाली. सुरुवातीला बॉलपेनसुद्धा अधूनमधून बंद पडणारी, न उठणारी वगैरे असायचीच. मग पुढचं धातूचं टोक दाताने  काढून नळीला फुंकर मारून पुन्हा चालू करायची. ते चालू करत असताना त्यामागच्या प्लास्टिकच्या नळीतून अचानक जास्त शाई बाहेर यायची आणि पुन्हा हात निळे करणे आलेच. या अशा सर्व प्रवासातून आता बऱ्यापैकी बॉलपेन आलेली आहेत. बॉलपेन रिफिल बदलणे हा प्रकार बंद झाला आहे. आता पेन बिघडले की पेनच फेकून द्यायचे आणि दुसरे घ्यायचे.  

तरीसुद्धा आता मला वाटते पेनचा वापर सुद्धा हळूहळू बंद होत जाणार. आता मी सुद्धा हा लेख लिहिलेला आहे तो पेनच्या मदतीशिवाय लिहिलेला आहे.  येथून पुढे मोबाईल, कॉम्प्युटर यावरील टायपिंग या प्रकाराने पेनचे संपूर्ण उच्चाटन होईल असे वाटते. आता आमची नातवंडेसुद्धा ऑनलाइन शिक्षणाला सरावत आहेत.  बहुतेक काही वर्षातच परीक्षागृहांमध्ये  कॉम्प्युटरच असतील, आणि त्यावर बोलून टायपिंग करून उत्तरे लिहिता येतील. अशा तऱ्हेच्या परीक्षाही सुरू होतील. सध्या मोबाईलवर आपण बोलून टायपिंग करू शकतो. पण नंतर चुका सुधारत बसावे लागते. त्यात बर्‍याच सुधारणा नजीकच्या काळात होतीलच. 

… आपण बोलून बरोबर अक्षरे टाईप होत राहतील.  

याच पद्धतीने नजीकच्या काळात अक्षर लेखनाचे संपूर्ण उच्चाटन होईल हे नक्कीच.  पण तरीसुद्धा अक्षर लेखनाचा आमचा भूतकाळ आठवून खूप खूप मज्जा येते हे सांगायला हवे का ?

 श्री सुनील देशपांडे

मो – 9657709640

email : sunil68deshpande@outlook.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “नमामि देवि नर्मदे…” – लेखिका : सुश्री शेफाली वैद्य ☆ प्रस्तुती – सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

? मनमंजुषेतून ?

☆ “नमामि देवि नर्मदे…” – लेखिका : सुश्री शेफाली वैद्य ☆ प्रस्तुती – सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

कधीतरी शाळकरी वयात दुर्गाबाई भागवतांचा ‘महेश्वरची महाश्वेता’ हा अहिल्यादेवी होळकरांवरचा लेख वाचनात आला आणि मी पार भारावून गेले. देवी अहिल्याबाईंचं सोज्वळ, शालीन व्यक्तिमत्व, व्यक्तिगत आयुष्य एकामागोमाग एक अंगावर कोसळणाऱ्या डोंगराएवढ्या दुःखांनी चिणून गेलेलं असतानाही त्यांनी केवळ इंदूर संस्थानच्या रयतेवरच नव्हे, तर पूर्ण भारतातल्या गरीब, पीडित जनतेवर धरलेला आपल्या मायेचा पदर, देवासाठी, हिंदूधर्मासाठी करून ठेवलेली कामे, आणि त्यांची व्रतस्थ राहणी, सगळ्यांनीच माझ्या कोवळ्या मनावर खूप परिणाम केला होता. तेव्हापासूनच अहिल्याबाई आणि त्यांचे लाडके महेश्वर मनात घर करून बसले होते. कुणीतरी दिलेलं मोरपीस जपून पुस्तकाच्या पानांमध्ये ठेवावं तसं मनात जपून ठेवलेलं. महेश्वरच्या विस्तीर्ण दगडी बांधीव घाटांच्या पायऱ्यानां हळुवार गुदगुल्या करणारी नर्मदा,  महेश्वरमध्येच विणलेल्या महेश्वरी साडीइतका नितळ, झुळझुळीत नर्मदेचा विशाल प्रवाह, शुभ्र साडीतली अहिल्याबाईंची कृश मूर्ती, त्यांच्या हातातलं बेलपत्राने सुशोभित झालेलं शिवलिंग, सारं काही न बघताही माझ्या मनात खोल रुतून बसलेलं होतं. पुढे पाच वर्षांपूर्वी मी महेश्वरला पहिल्यांदा गेले तेव्हा मला खूप वर्षांनी माहेरी गेल्याचा आनंद झाला होता. 

इंदूर. मल्हारराव होळकरांनी आपल्या कर्तबगारीने उभारलेलं तत्कालीन मध्य भारतातलं एक इवलंसं संस्थान. मल्हाररावांना एकच मुलगा, अहिल्याबाईंचा नवरा खंडेराव   होळकर. कुंभेरीच्या लढाईत खंडेराव तोफेचा गोळा वर्मी लागून मृत्यू पावले. तत्कालीन प्रचलित चालीरीतींप्रमाणे अहिल्याबाई त्यांच्यामागे सती जायला निघाल्या तेव्हा मल्हाररावांनी डोळ्यात पाणी आणून त्यांना मागे खेचलं. अहिल्याबाईंचा वकूब त्यांना माहिती होता. पुढे पूर्ण राजकारभार मल्हाररावांनी आपल्या ह्या कर्तबगार सुनेच्या हाती दिला. अहिल्याबाईंनी सासऱ्यांचा विश्वास सार्थ ठरवत आपलं इंदूर संस्थान तर उत्तम प्रकारे सांभाळलंच, पण त्यांच्या पदराची सावली फार मोठी होती. देशभरातल्या हिंदू जनतेसाठी अहिल्याबाईंनी जे काम करून ठेवलंय तसं काम क्वचितच दुसऱ्या कुठल्या भारतीय राजा किंवा राणीने केलं असेल. 

धर्मांध मुसलमानी आक्रमकांनी हिंदू मंदिरे उध्वस्त केली होती. त्यांनी घातलेले घाव केवळ दगडांच्या भिंतीवर पडले नव्हते तर त्या घावांनी हिंदूंची मनेही छिन्न-विछिन्न करून टाकली होती. जेव्हा अहिल्यादेवीनी सोमनाथ आणि काशीला नवीन शिवालये बांधण्याचा घाट घातला तेव्हा त्या नुसती दगड मातीच्या इमारती उभारत नव्हत्या , त्या उभारत होत्या सर्वसामान्य हिंदूंची हिंमत. सततच्या पराभवांनी गांडुळासारख्या लिबलिबीत झालेल्या सामान्य हिंदू समाजमनाला अहिल्याबाई फिरून एकवार सामर्थ्याचा फणा काढायला डिवचत होत्या, शिकवत होत्या.

अगदी आजही भारताचा नकाशा बघितला तर अहिल्याबाईंच्या पाऊलखुणा तुम्हाला जागोजागी दिसतील. त्यांनी बांधलेल्या नदीवरच्या घाटांवर अजूनही भारतातले लोक तीर्थस्नानाला जातात. काशी-सोमनाथ पासून ते गयेमध्ये त्यांनी घडवलेल्या, जीर्णोद्धार केलेल्या मंदिरांमध्ये आजही हिंदू दर्शनासाठी रांगा लावतात. त्यांनी बांधलेल्या धर्मशाळा आपल्याला हिमालयामध्ये बद्रिकेदार ते दक्षिणेत रामेश्वरम पर्यंत सापडतील. त्या धर्मशाळा अजूनही थकलेल्या, गांजलेल्या हिंदू यात्रेकरूंना आश्रय देतात. हे सगळं प्रचंड काम अहिल्याबाईंनी केलं ते आपल्या अवघ्या अठ्ठावीस वर्षांच्या कारकिर्दीत, स्वतः व्रतस्थ राहून, आपल्या वैयक्तिक गरजा अत्यंत कमी करून. आपल्या खासगी मिळकतीतला पैसानपैसा वापरून अहिल्याबाईनी धर्मासाठी हे डोंगराएवढं काम केलं. 

औरंगझेबाने त्याच्या अखेरच्या दिवसात स्वतः टोप्या विणून आणि कुरणाच्या प्रती हाताने लिहून स्वतःच्या कफनापुरते पैसे जमवले होते ह्याचे गोडवे आपण खूपदा ऐकलेत, पण अहिल्याबाई कित्येक वर्षे एकभुक्त राहिल्या, राणी असताना काठ-पदर नसलेल्या साध्या पांढऱ्या माहेश्वरी सुती साडीखेरीज कधी त्यांच्या अंगाला दुसरं वस्त्र लागलं नाही. एका रुद्राक्षांच्या माळेखेरीज त्यांनी कधी दुसरा दागिना अंगावर ल्यायला नाही. त्यांचा महेश्वर मधला वाडा ‘राजवाडा’ म्हणून घेण्यासारखा कधी भव्य-दिव्य आणि दिमाखदार दिसला नाही. हे सगळं करून अहिल्याबाईंनी जो पैसा वाचवला तो सगळाच्या सगळा देवळांची बांधकामं, नदीवरचे घाट, धर्मशाळा इत्यादी धर्मकार्यात खर्च केला हा इतिहास किती जणांना माहित आहे?

गेल्या आठवड्यात परत एकदा महेश्वरला जायचा योग आला. माहेश्वरी साड्या कश्या विणतात ते बघायला तामिळनाडूच्या को-ऑप्टेक्स चे एमडी वेंकटेश नरसिंहन ह्यांनी आयोजित केलेल्या दौऱ्याचा एक भाग म्हणून आम्ही काही समानधर्मी लोक महेश्वरला गेलो होतो. माझी ह्याआधीची पहिली महेश्वर वारी भर उन्हाळ्यात होती त्यामुळे नर्मदेचा प्रवाह थोडा क्षीण झालेला आणि धापा टाकायला लावणारी निमाडची गरमी. ह्यावेळी मात्र आम्ही महेश्वरचा सुखद हिंवाळा मनसोक्त अनुभवला. ह्यावर्षी पाऊस खूप झाला त्यामुळे नर्मदेचा प्रवाह खूपच विशाल आणि विस्तीर्ण भासत होता. आम्ही घाटावर पोचलो तेव्हा सरती संध्याकाळ होती, उन्हे नुकतीच कलायला लागली होती. नर्मदेपारच्या गावांमधले लोक बाजारहाट करून आपापल्या गांवी परत निघाले होते. नर्मदेचा प्रवाह शांत वहात होता. आम्ही ज्या ठिकाणी उभे होतो त्या ठिकाणी कधीतरी अहिल्यादेवीही उभ्या राहिल्या असतील ह्या विचारानेच माझ्या अंगावर काटा आला. आजही महेश्वर वासियांसाठी अहिल्याबाई ‘रानी माँ’ आहेत. त्यांचं अस्तित्व आजही आपल्याला महेश्वरमध्ये जाणवतं. 

बघता बघता सूर्य हळूहळू क्षितिजाकडे झुकायला लागला. प्रवाहात उभा असलेला एक मोठा खडक प्रदीप्त झाल्यासारखा दिसत होता, दूरवर गांवकऱ्यानी भरलेल्या बोटी संथपणे नर्मदेचा प्रवाह कापत पलीकडे चालल्या होत्या. आता सूर्याचा रसरशीत लालभडक गोल अलगद नदीच्या प्रवाहाला टेकला होता, जणू आई नर्मदेच्या कपाळावरचा ठसठशीत कुंकवाचा टिळा. आता घाटावरची गर्दी कमी झाली होती. प्रवाहाच्या अगदी जवळ, घाटाच्या शेवटच्या पायरीवर एक बाई उभ्या राहून मावळत्या सूर्याला अर्घ्यदान करत होत्या. सगळीकडे नीरव शांतता, फक्त नर्मदेच्या मंद वाहत्या लाटांचा आवाज आणि आमचे दीर्घ श्वास. अंगावर शिरशिरीच आली एकदम.

तेवढ्यात पूजेची तयारी असलेले तबक घेऊन एक गुरुजी आले. रोजच्या नित्य नर्मदाआरतीची वेळ झाली होती. ही आरती म्हणजे ऋषिकेशच्या किंवा वाराणसीच्या गंगा आरतीसारखी दिमाखदार नव्हे, अगदी साधी सुधी, घरगुती, अगदी अहिल्याबाईंच्या व्यक्तिमत्वासारखी सोज्वळ आणि शांत. आरती करणारे एक गुरुजी, त्यांच्या मागे टाळ वाजवणारे दुसरे आणि मागे कोरसमध्ये गाणारा एक तिसरा तरुण. बस एवढंच. फक्त तीन माणसं आणि आमचा ग्रुप. आरती झाली आणि त्या गुरुजींनी स्वच्छ स्वरात आदी शंकराचार्यांचे नर्मदाष्टक म्हणायला सुरवात केली. 

सबिन्दुसिन्धुसुस्खलत्तरङ्गभङ्गरञ्जितं

द्विषत्सु पापजातजातकारिवारिसंयुतम् ।

कृतान्तदूतकालभूतभीतिहारिवर्मदे

त्वदीयपादपङ्कजं नमामि देवि नर्मदे… 

मंतरलेली संध्याकाळ होती ती, आदी शंकराचार्यांचे अलौकिक शब्द, नर्मदामैय्याचा चिरंतन प्रवाह, देवी अहिल्याबाईंचा आशीर्वाद, नर्मदेच्या प्रवाहाबरोबर वाहत चाललेले द्रोणांचे दिवे आणि मंत्रमुग्ध होऊन ऐकणारे आम्ही. आयुष्यात काही क्षण असे येतात की ते अनुभवताना जिणं सार्थक झाल्यासारखं वाटतं. नर्मदेकाठची ती संध्याकाळ तशी होती. 

लेखिका : सुश्री शेफाली वैद्य

प्रस्तुती : सुश्री मंजुषा सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “रुजण्या” वरून सहजच… ☆ सुश्री मधुमती वऱ्हाडपांडे ☆

सुश्री मधुमती वऱ्हाडपांडे

??

☆ “रुजण्या” वरून सहजच… ☆ सुश्री मधुमती वऱ्हाडपांडे ☆ 

मध्यंतरी lockdown मुळे बाहेर फिरणं बंदच होतं. त्यामुळे सकाळ संध्याकाळ एखादी चक्कर गच्चीवर असायचीच. आमचं राहणं फ्लॅट मध्ये. त्यामुळे गच्ची सगळ्यांचीच कॉमन. आमचा फ्लॅट तिसऱ्या अन सगळ्यात वरच्या मजल्यावर. आमच्या खाली राहणाऱ्या बिऱ्हाडकरुंना गॅलरीतल्या बागेची मोठी हौस. आमच्या गॅलरीतून त्यांची विरुद्ध बाजूची गॅलरी व्यवस्थित दिसते. सुंदर सुंदर फुलं बघून मन प्रसन्न होतं नेहमीच.  त्यांच्या गॅलरीत सतत कुंडयांची भर पडतांना दिसायची. शेवटी  इतक्या कुंड्या झाल्या की त्यांनी त्यातल्या  बऱ्याचशा कुंड्या गच्चीवर आणून ठेवल्या. आता गच्चीवरचं  फिरणं अजूनच प्रसन्न व्हायला लागलं. त्यात त्यांनी दोन मोठ्ठ्या थम्प्स अप च्या बाटल्यांना गोल गोल छिद्र करून त्यात माती भरली अन प्रत्येक छिद्रात ऑफिस टाइम (टेन ओ क्लॉक) ची एक एक काडी लावलेली. सकाळी 10 च्या सुमारास त्या राणी कलरच्या पिटुकल्या फुलांनी भरलेल्या बॉटल्स इतक्या सुंदर दिसायच्या की मलाही मोह आवरला नाही. मी त्यातल्या दोनतीन  काड्या तोडल्या अन आमच्या हॉल च्या खिडकीत एका छोट्याश्या बोळक्यात दिल्या टोचून.  

पावसाळी हवा असल्याने म्हणा किंवा काय माहिती तीन चार दिवसातच  त्या इतक्या छान भराभरा वाढल्या अन त्या दिवशी बघते तर काय! तीन पिटुकली टवटवीत  फुलं मस्त डोलताहेत मजेत! सहजच  विचार आला मनात की  किती पटकन, विनासायास ही रुजली नवीन मातीत, नवीन जागेत. आणि इथेही उधळून देताहेत आनंद सभोवती. जागा बदलली, माती बदलली म्हणून कुठ्ठे कुरकुर नाही, खेद नाही, कुढणं नाही की नाखुषी नाही. गच्चीवर आनंदाची उधळण होतीच त्यांची अन तिथून उचललं तरी बहरणं सुरूच! 

आणि ह्याउलट आपण केवढे सवयीचे गुलाम! अगदी सकाळच्या टूथपेस्ट पासून आपल्याला कुठ्ठे, कुठ्ठे म्हणून बदल सहन होत नाही. टूथपेस्ट तीच हवी, चहा तोच अन त्याच चवीचा आवडणार, दूध अमुक एकच, वर्तमानपत्राची सुध्दा सवय झालेली. बदलून बघितला की, “छे बुवा! हयात काही राम दिसत नाही. आपला नेहमीचाच बरा शेवटी” असंच म्हणणार हे पक्के! दिवसभरात कितीतरी गोष्टी असतात आपल्या “अमुकच हवं” वाल्या. अगदी सकाळच्या टूथपेस्टपासून  ते थेट  झोपायची जागा, उशी आणि पांघरूण पर्यंत सर्व! माणूस शेवटी सवयीचा गुलामच!  वाटलं ह्या टेन ओ क्लॉक ला गुरु करून कुठेही पटकन ऍडजस्ट होणं शिकायला हव माणसांनी. किती सोपं होईल सगळ्यांचं आयुष्य! 

अर्थातच सगळ्या परिस्थितीत स्वतःला सहज बदलवू शकणारेही बघतोच आपण आजूबाजूला. नक्कीच त्यांचे आयुष्य तुलनेने सहज, सोपे जात असणार ह्यात शंकाच नाही. रुजणं शब्दावरून मग सहजच मनात आले की अगदी जुन्या काळामध्ये मुलामुलींची फार लवकर लग्न व्हायची त्यामुळे बालवयातच सासरी आलेल्या मुलींना त्या नवीन वातावरणामध्ये स्वतःला रुजवून  घेणे तितकेसे कठीण जात नसे नंतर नंतर म्हणजे आमच्या पिढीमध्ये थोडा बदल झाला. मुलींची लग्न वयाच्या वीस-बावीस च्या वयात व्हायला लागलीत त्यामुळे थोडा त्यांना सासरी जमवून  घ्यायला किंचित वेळ लागू लागला पण तरीही लहानपणापासून शेवटी सासर हेच तुझं खरं घर आहे असं मनावर पक्क बिंबवले गेले असल्याने बहुतांश जणीनी हे सहज मान्य केले आणि विनातक्रार रुजल्या. त्यानंतरची पिढी म्हणजे सध्याची तरुण पिढी (आपल्या मुला-मुलींची पिढी) ह्यामध्ये आणखी थोडा बदल झाला आता मुलं किंवा मुली अजून जास्त परिपक्व झाल्यानंतर लग्न व्हायला लागलीत. कदाचित त्यामुळेही असेल पण “थोडं तुझं थोडं माझं” असं म्हणत व्यवस्थित संसार होतांना दिसत आहेत, (अर्थात अपवाद असतातच म्हणा!) आजकालच्या मुलामुलींना हे तेवढं कठीण जात नाही कारण बहुतेक सगळीकडे राजाराणीचे संसार असतात. दोघेही समजदार पणा दाखवत  “थोडं तुझं,थोडं माझं” करत एकमेकांशी जुळवून घेत गोडीगुलाबीने, गुण्यागोविंदाने  राहतांना दिसतात. त्यात बहुतांश ठिकाणी दोघेही नोकरी करणारेच असतात. त्यामुळे खूप कमी वेळ एकमेकांच्या सहवासात राहतात. अर्थात स्वतंत्र मनोवृत्तीमुळे  थोडे फार संघर्ष अटळ असतात पण ते त्यांचे निभावतात. आणि ह्या पिढीमध्ये मुलांच्या विश्वामध्ये, संसारामध्ये आई-वडिलांनीही स्वतःला थोडं बदलवत रुजवून घेतलेलं आहे. यानंतरच्या पिढीमध्ये मात्र काय होईल सांगता येत नाही. मला तरी वाटतं “थोडं तुझं,थोडं माझं” असा सुवर्णमध्य न गाठता “तू तुझं नी मी माझं”  ह्या प्रकारात जर सर्व व्यवहार चालणार असतील तर बाकी कठीण आहे! कारण संसार सुरळीत चालण्यासाठी हे एकमेकांच्या विश्वात  “रुजणं” दोघांनाही व्यवस्थित जमलं तरच  संसार रुपी रोपटे छान सुंदर बहरणार हे नक्की! अगदी टेन ओ क्लॉक सारखे!

तसं पाहिलं तर अगदी शाळेत पहिल्यांदा जाणाऱ्या  मुलालाही त्या नव्या वातावरणात रुजावंच लागतं आणि थेट रिटायर्ड झालेल्या आजोबांनाही नव्याने आपल्या स्वतःच्याच घरात पुन्हा रुजावंच लागतं! थोडक्यात काय तर रुजणं म्हणजे बदललेल्या परिस्थितीशी, वातावरणाशी जुळवून घेता येणं! सध्याच्या आमूलाग्र बदललेल्या युगात सगळं नवीन तंत्रज्ञान नीट माहिती करून घेणं आणि वेगवेगळ्या माध्यमांचा योग्य रीतीने वापर करणं म्हणजे तरी काय शेवटी? स्वतःला डिजिटली रुजवण्याचाच एक प्रकार! आयुष्यातल्या असंख्य टप्प्यांवर वेळोवेळी प्रत्येक ठिकाणी जितकं सहज स्वतःला रुजवता येतं तितकं तुमचं आयुष्य कमीअधिक सोपं होत जातं हे निश्चित! रुजणं टेन ओ क्लॉक चं असो का तुमचं आमचं! शेवटी तात्पर्य एकच हो!

© सुश्री मधुमती वऱ्हाडपांडे

मो 9890679540

अकोला

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ‘कुचंबले किचन’ – श्री दिवाकर बुरसे ☆ प्रस्तुती – सुश्री सुलू साबणे जोशी ☆

सुश्री सुलू साबणे जोशी

??

☆ ‘कुचंबले किचन’ – श्री दिवाकर बुरसे ☆ प्रस्तुती – सुश्री सुलू साबणे जोशी

जिथे नव्या हाऊसिंग स्कीम्स उभारल्या जात आहेत, सोसायट्यांचा पुनर्विकास झाला आहे/ होत आहे, नवीन टाॕवर्स, नव्या इमारती बांधल्या गेल्या आहेत किंवा जात आहेत, त्यांच्या १-२-३ बीएचके फ्लॅटमध्ये किचनचा एवढा संकोच करून ठेवला आहे की, जेमतेम एक माणूस कसाबसा उभा राहू शकतो ! गेल्या ५-७ वर्षात मुख्यतः महानगरातून हे विशेषत्वाने आढळून येते. 

नक्की काय खूळ (कदाचित व्यावसायिक लाभाचे गणित?) बसले आहे या पुनर्विकासक/ बिल्डर/इंटीरियर करणाऱ्या लोकांच्या डोक्यात काही कळत नाही.

ह्या लोकांना असे का वाटते की, हल्ली कोणी घरी स्वयंपाक करतच नाही. सगळे रोज सकाळ संध्याकाळ बाहेरील हाॕटेलांत आॕर्डर देऊन तिथून घरी पार्सल मागवून खातात.

हल्ली कोणी कोणाच्या घरी जात नाही की येत नाही. कुटुंबे लहान आहेत. (घरात जास्तीत जास्त तीन सदस्य!) घरी पाहुण्यारावळ्यांचा राबता नसतो. मामाच्या घरी येऊन धुडगूस घालणारी, मामीकडे शिक्रण पोळीचा हट्ट धरणारी व्रात्य भाचरे नसतात. त्यामुळे भांडी, ताटे, वाट्या, पातेली, डाव, ओगराळी किंवा गेला बाजार क्रोकरी असले अवजड सामान ठेवायला कशाला जागा लागते? तेव्हा ती वाचवलेली जागा या नवीन रचनेत बेडरूम, हॉल मोठा करण्यात वापरू या. त्यांचे मानस खरेच असे आहे का?

ज्या लोकांचे १९८५ ते ९५ सालापर्यंत घेतलेले फ्लॕट आहेत, ते लोक नवीन फ्लॕट  बघायला जातात, तेव्हा तिथले किचन पाहिल्यावर त्यांचे डोकेच सटकते. 

मी काय म्हणतो, बांधकाम व एफ एस आय इ.चे नियम बदलले आहेत/असतीलही. त्यामुळे घराच्या – साॕरी फ्लॕटच्या, रचनेत बरेच बदल करावे लागत असतील, हेही मान्य करूया. पण भारतीय संस्कृतीमध्ये  घरातील सगळ्यात महत्त्वाचे असलेले स्वयंपाकघर म्हणजे किचन, चक्क त्याचाच बळी पडत आहे. किचनचा असा श्वास कोडणारा संकोच करणे अमान्य आहे. अहो, असे करुन कसे चालेल बरे?

पुनर्विकास करताना या किचन कुचंबणेचा गांभीर्याने विचार व्हायला हवा. गृहिणींनीही नव्या फ्लॕटमधे मोठ्या किचनचा आग्रह धरावा. मला वाटते की, हा स्त्रीहट्ट योग्य आहे आणि तो पुरवायला हवा.

सोसायट्यांच्या पुनर्विकास समित्यांनी व विकासकांनी या सूचनेचा गंभीरपणे विचार करावा. या सूचनेला महत्व व प्राधान्य द्यावे. 

घरोघरीच्या (गृह) लक्ष्मींना प्रसन्न करण्याची, पुनर्विकासाच्या निमित्ताने घर चालत आलेली ही सुवर्णसंधी, कोणाही ‘धूर्त व चाणाक्ष’ पुरुषाने अजिबात दवडू नये.

लेखक : श्री दिवाकर बुरसे

पुणे

संपर्कः ९२८४३००१२५

संग्राहिका : सुश्री सुलू साबणे जोशी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “टिप टॉक !” —☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

 

? मनमंजुषेतून ?

☆ “टिप टॉक !—  ☆ श्री संभाजी बबन गायके 

टीप हा शब्द अगदी मनाच्या तळाशी जाऊन बसला आहे लहानपापासूनच ! जो पर्यंत टीप द्यावी लागत नव्हती तो ही टीप तशी तळटीपच होती !

ही टीप पुस्तकांत खाली छापलेली दिसायची. आमंत्रण पत्रिकेत जवळ जवळ धमकी या शब्दाला पर्यायी शब्द म्हणून नजरेस पडायची.

कपडा फाटला की त्याला टेलर काकांना विनंती करून ही टीप मारून घ्यावी लागे ! त्यांनी जास्त पैसे मागितले की डोळ्यांतून टिपे गळायची बाकी रहात ! अशावेळी एवढ्याशा कामाचे एवढे पैसे? असे शब्द अगदी tip of my tongue यायचे ! पण घाबरून जिभेची हीच टीप चावावी आणि गप्प बसावे,असे होई !

काही लोक पोलिसांना टीप देतात, किंवा त्यांना ती कुठून तरी मिळते,असेही वाचनात येते अधून मधून !

टीपटॉप नावाची टेलरिंग दुकाने असतील तर अशी टीप मारून देणे ते लोक कमी पणाचे समजतात ! असो.

शहरातल्या हॉटेलात जायला लागल्यापासून टीप शब्दाचा आणि त्यामागचा ‘ अर्थ ‘ समजू लागला.

खरं तर या कल्पनेमागे खूप सुंदर कल्पना आहे,असे वाटते ! विशेषतः hospitality industry मध्ये नम्रता, ग्राहकाभिमुख सेवा, आणि अचूक सेवा या बाबी महत्त्वाच्या असतात. लोक सारं काही छान, भारी मिळावं म्हणून पैसे खर्च करतात. हल्ली तर hospital industry आणि hospitality industry सारख्याच महाग असतात. कोरोना काळात या दोन्ही सेवा मेवा मिळवत राहिल्या ! श्रीमंतांनी five star उपचार घेतले आणि गरिबांनी दिवसा star पाहिले डोळ्यांसमोर ..बिलाचे आकडे पाहून ! असो. .. तर ..वेटर इत्यादी मंडळी हसतमुख सेवा देतात, काय खावे, काय परवडेल याचे मार्गदर्शन करतात, वेळेवर पदार्थ आणून देतात, उरलेले पदार्थ तत्परतेने पार्सल करून देतात, इत्यादी शेकडो कारणांनी या सेवकांना काही रक्कम स्वखुशीने देणे,अपेक्षित असते. यात आता स्वखुशीे दूर गेली आहे ! काही हॉटेल मध्ये काम करणाऱ्या वेटर मंडळीमध्ये सुका आणि ओला असे दोन प्रकार असतात म्हणे ! सुका म्हणजे फक्त पगार घ्यायचा ! तिथले अन्न मिळणार नाही. ओला म्हणजे अन्न आणि पगार ! या ओलाचा पगार तसा कमीच असणार !

मुळातच या व्यवसायात बिचारी नाडलेली मंडळी दिसतात. नाईलाजाने हा डगला अंगावर चढवलेली… बँडवाल्यांसारखी ! अन्न वाढणारे वेटर आणि आनंदाच्या धुना वाजवणारे वादक यांचे चेहरे पाहून घ्यावेत !

या लोकांची काही वरकमाई करण्याची इच्छा असते. ग्राहकाने झालेलं Bill पूर्ण देऊन काही रक्कम यांच्यासाठी ठेवावी,अशी त्यांची मूक मागणी असते. विशेषतः आपण त्यांच्याकडे bill चे पैसे दिले, त्याने ते pay करून आणून त्या पाकिटात ठेवले तर उरलेले सुट्टे पैसे ग्राहकाने तसेच ठेवावेत,असे त्यांना वाटते. त्यासाठी हे सेवक आपल्या टेबलच्या आसपास अदबीने आणि छुप्या रीतीने घुटमळत राहतात. आपली पाठ वळताच लगबगीने त्यातील पैसे खिशात घालतात. अपेक्षेनुसार रक्कम नसेल तर एकमेकांना नजरेने इशारे करत राहतात. अर्थात हे हॉटेलनुसार बदलते. भारी हॉटेलात जाणारे भारी लोक काही वेळा keep the change असं म्हणून उठून जातात. त्यांच्यामुळे इतर सामान्य लोकांना change व्हायला लागले आहे.  मोठ्या हॉटेलांत पहिल्यांदा गेलेले लोक चक्क तिथल्या स्मार्ट वेटर बांधवांना काहीसे बिचकुन असतात !

मोठ्या हॉटेलच्या bill मध्येच काही टक्के रक्कम आधीच कापून घेतात म्हणे ! काही ठिकाणी टीप टाकण्यासाठी box असतात. ही रक्कम वेटर आपसात वाटून घेत असावेत. जास्त महागडे पदार्थ मागणाऱ्या ग्राहकांकडून जादा टीप मिळण्याची शक्यता असल्याने तिथे अधिकचे सौजन्य दाखवले जात असावे का? टिप देण्यास टाळाटाळ केली किंवा अगदीच कमी दिली तर कदाचित पुढल्या वेळच्या सेवेत काही बदलही होऊ शकतात ! आपला नवरा किंवा मुलगा वेटरसाठी किती रक्कम मागे ठेवतो,यावर काही पत्नी,माता लक्ष ठेऊन असतात. आणि त्यातील काही रक्कम परस्पर कमीही करतात !

पण टीप देणे ही एक नाजूक गोष्ट असते. याचे चलन आपल्याकडे परदेशातून आले असले तरी दिवाळी पोस्त,बक्षिसी इत्यादी प्रकार आहेतच आपल्याकडे आधीपासून. राजे लोक तर चक्क त्यांच्या हातातल्या, गळ्यातल्या सोन्याच्या वस्तू सेवकांना बहाल करीत असत. 

परदेशात आणि आता आपल्याकडेही महिला वेटर मोठ्या प्रमाणात असतात. गोष्ट परदेशातील आहे…एक गरोदर महिला वेटर…ती धावपळ करीत होती..तिला आणखी काही महिने तरी काम करण्याशिवाय पर्याय नव्हता. एका टेबलवरील चार मित्रांनी तिची अवस्था जाणली..आणि तिला तीन महिने पुरेल एवढी रक्कम आपसात जमा करून टीप म्हणून दिली…तिच्या डोळ्यांतील भाव अवर्णनीय होते !

एक आणखीन गोष्ट ! दुपारी हॉटेल बंद होण्याची वेळ. एक आठ दहा वर्षांचा मुलगा सायकलवर घाईघाईत आला. महिला वेटर वैतागली..आता हा कशाला आला काम वाढवायला ! तिने विचार केला. काहीशा नाराजीनेच त्याच्यापुढे मेन्यू कार्ड ठेवले. त्याला ice cream पाहिजे होते. एक छान ice cream १०० रुपयांचे होते आणि त्यापेक्षा स्वस्त आणि साधेसे ८० रुपयांचे. त्याच्याकडे १०० रुपये होते ! पण त्याने ८०चे मागवले. वेटर महिलेने काय भिक्कार ग्राहक म्हणून नाराजीने order serve केली आणि ती आवरायला निघून गेली. ती परत टेबलाशी आली तोवर तो मुलगा निघून गेला होता…तिने bill ठेवतात ते पाकीट उघडलं.. त्यात २० रुपये ठेवले होते…टीप म्हणून ! तिला टीप देता यावी म्हणून त्यानं कमी किमतीचे ice cream order केलं होतं ! ती वेटर महिला आपल्या डोळ्यांतले अश्रू रोखू शकली नाही !

टिप: इथेच थांबतो. बाकी तुम्ही सांगा… शेवटी या विषयाच्या हिमनगाचे हे मी लिहिले ते फक्त एक tip म्हणजे टोक आहे !

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ टिपकागद व्हावे… सौ विदुला जोगळेकर☆ सौ उज्ज्वला केळकर ☆

सौ उज्ज्वला केळकर

??

☆ टिपकागद व्हावे… सौ विदुला जोगळेकर☆ सौ उज्ज्वला केळकर ☆

जाड बुडाच्या कढईत साजूक तुपातले बेसन…हलकेच रंग बदलत होते…

तुपात लपथपलेले…थुलथुलीत…उलथन्याने जरा हलवता कढयीभर गोळा होत फिरणारे…अजून किंचित भाजायला हवे आहे…पिठीसाखर पडली की बेसनाचा रंग फिका होईल…आता मात्र खमंग तांबूस रंग दिसायला लागला..तिने गँस बंद करून टाकला.आच संपताच पीठ स्थिरावले….तुपाचा चकचकीतपणा अंगाखांद्यावर लेऊन मस्त कढईभर सैलावून बसले. ‘ तूप जास्त होणार कदाचित ‘, तिच्या मनाला सराईत नजरेने सांगितले… व्याप वाढणार…तिने कोरडे पीठ भाजून घालावे या विचाराने डब्याकडे बघितले…घर म्हणून ठेवलेले जेमतेम वाटीभर पीठ होते…पिठीसाखर घातल्यावर किती आळते ते बघून ठरवू काय करायचे ते … तिने लाडवातून डोके काढून पुढच्या कामांना सुरुवात केली. तरीही मनाच्या एका कोपऱ्यात अति सैलावलेला लाडू ठाण मांडून बसलाच होता.

निवलेल्या पिठाच्या गोळ्यात पिठीसाखर घालून…ती लाडू आळण्याची वाट बघत बसली…साखर मुरल्यावर जरा आळले तर आळतील…वाऱ्याच्या दिशेला जरा पसरुन ठेवले तर आळतील…सतराशेसाठ वाटा…चुकलेल्या दिशेला जागेवर आणायला धावत येतात…! पण छेः … बाहेरच्या तापमानाशी सख्य साधत लाडवातलं तूप अगदी मनसोक्त साखरेसहित परत ऐसपैस पहुडलेलं बघून…आता या अतिरिक्त स्निग्धतेचं काय करावं हा प्रश्न तिला पडला. 

कमी पडलं तर वरुन पटकन घालता येतं.  पण जास्त झालं तर मात्र त्यातून सहजासहजी काढून घेणे होत नाही….. मग ते पदार्थ असो, नाहीतर माणुस असो. समत्वाला ममत्व येऊन मिळाले की अतिरिक्त स्नेह वाढतोच…आणि गोष्टींचा थोडा तोल ढळल्यासारखा होतो, आणि मग तो कधीकधी असा तापदायक ठरतो.

याचं जिवंत उदाहरण म्हणजे हे स्वयंपाकघरातले पदार्थ ! अशी अतिरिक्तता माणसांच्या स्वभावातूनही वेगवेगळ्या तऱ्हेने ओसंडून वहात असते…!

काही काळापुरता टिपकागद होऊन जडलेले नाते…ती अतिरिक्तता शोषून घेते आणि अलिप्त होऊन पुढचा मार्ग चालू लागते….. 

… येस्स…खरंच की…थोड्या कोरड्या कणिकेवर तिने टिश्यू पेपर (टिपकागद) पसरला आणि त्यावर ते लाडवाचं मिश्रण पसरुन ठेवलं…हलके हलके मिश्रणातील तूप टिश्यूवर दिसू लागले….आणि खालची कणिक तो स्निग्धांश स्वतःत शोषून घेऊ लागली…! लेकीने विचारले, “ आई साखरेचा गोडवा तर नाही 

ओढून घेणार तो टिपकागद…?” 

“ नाही ग…शोषून फक्त ओलावा आणि स्निग्धता घेता येते. कोरडेपण फक्त आपलं अस्तित्व जपत मिसळून जाते फार तर ! “

न सांगता काय अन् किती टिपावं हे त्या कागदाला स्वभावतःच समजलेलं असतं …उगाच गरजेपेक्षा जास्त लगट ते इतक्या जवळ असूनही करत नाही…हे जर ज्या त्या नात्याला कळलं तर…टिपकागद होऊन प्रत्येक नात्यातली भूमिका निर्लेपपणे पार पाडता येईल. अतिरिक्त ओल/स्निग्धता तेव्हढी शोषून घेउन ,परत ज्याचं त्याचं स्वातंत्र्य मान्य करुन…अलिप्त होणारा टिपकागद तिला फार आपलासा वाटला. कागदावरचे लाडवाचे मिश्रण आता लाडू बांधण्याइतके नक्कीच आळले होते…कणकेतला मिसळून गेलेला स्निग्धांश वायाही गेला नव्हता…मधला कागद मात्र आपलं काम बजावून शांतपणे बाजूला झाला…!

नात्यात ही असा टिपकागद होता आलं पाहिजे… म्हणजे नाती आकारात, गोडव्यात, आणि व्यवहारातही देखणी राहतात …… होय ना !

लेखिका : सौ विदुला जोगळेकर

प्रस्तुती : सौ उज्ज्वला केळकर

संपर्क –17 16/2 ‘गायत्री’ प्लॉट नं. 12, वसंत दादा साखर कामगारभावन के पास , सांगली 416416 महाराष्ट्र

मो. 9403310170, email-id – kelkar1234@gmail.com 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares