मराठी साहित्य – विविधा ☆ “आवडनिवड…” ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

सौ कल्याणी केळकर बापट

? विविधा ?

☆ “आवडनिवड…” ☆ सौ कल्याणी केळकर बापट

प्रत्येक व्यक्तीचा स्वतःच्या आवडीचा जणू एक साचाच असतो. त्या साच्यातून  तो आपल्याला आवडणारं राहणीमान, खानपान, वाचन,गायन,जीवन जगण्याची पद्धत ह्या सारख्या आवडी जपतं असतो. त्यामुळे तो जीवनात स्वतःला आवडणा-या गोष्टींचा आस्वाद घेतो पण हा आस्वाद घेतांना जर कधीतरी अवचट आपल्या आवडीचं वळण बदलून दुसऱ्यांच्या आवडीच्या वाटेवर चालून बघितलं तर ते कधीकधी जास्त पण आवडून जातं. पण असा बदल हा एखादेवेळीच स्विकारला जातो, एरवी आपली स्वतःची आवड,कल हा तसा ठाम असतो.

जबाबदा-या,कर्तव्य उरकंत आल्या की वेध लागतात स्वतः कडे नीट लक्ष देण्याचे, आपल्या आवडीनिवडी जपण्याचे, बरीचशी आवडती कामं,कला,छंद जोपासण्याचे. ह्या आवडीनिवडी,छंद जोपासण्याची पण एक  गंमत आहे.आपण दुसऱ्या ला सहजसहज सल्ले देतो,अमूक एक गोष्ट कर म्हणून आग्रही होतो पण विचार केला तर लक्षात येतं आपण सुचवलेली गोष्ट ही समोरच्या व्यक्तीच्या आवडीनुरुप आहे की नाही ? की आपण आपली मतं त्यावर लादतोय.माझा स्वतःचा पिंड नोकरी करण्याचा ह्या उलट माझ्या बहिणीचा पिंड हा अतिशय उत्कृष्ट, आदर्श अशी गृहीणी होण्याचा.माझ्या बहिणीसारखी सुगरण,टापटिप घर ठेवणारी,अगदी बारीकसारीक सगळ्यांच्या आवडीनिवडी जपणारी, घरच्यांच्या आरोग्याची उत्तम सुश्रुषा करणारी आणि घरच्या अगदी लहानात लहान कामापासून ते मोठमोठ्या कामांचा पण भार लिलया पेलू शकणारी स्त्री अभावानेच आढळते.  आणि ही सगळी कामं ती अतिशय आवडीने, आनंदाने आणि उत्स्फूर्तपणे करते. जर अशावेळी मी तिला बाहेर नोकरी करण्याचे सल्ले दिले तर तो तिच्यावर नुसता अन्यायचं होणार नाही तर तिच्या उत्तम व्यवस्थापन कौशल्याचा एक प्रकारे अपमानच होईल. थोडक्यात काय तर प्रत्येक व्यक्ती ही वेगळी असते,त्यामुळे आवडीनिवडी बदलविण्याच्या चुकीच्या अट्टाहासापेक्षा त्या व्यक्ती मधील गुणांना पुरक कौतुकाची थाप देणं,तिला उत्तेजन देणं ही खरी माणुसकी.

मला स्वतःला विचाराल तर आता नोकरीमुळे असलेल्या अतिशय व्यस्त दिनचर्ये पेक्षा निवृत्ती नंतरचे आयुष्य हे अतिशय शांत, कमी गजबजलेल्या ठिकाणी घालवायला आवडेल, त्यामध्ये माझं वाचनं आणि शांत ठिकाणी भ्रमंती व पर्यटन हे आलचं. प्रवासाचं म्हणाल तर माझ्या बकेटलिस्ट मध्ये सागरीप्रवास याने की क्रुझ वरुन सागराच्या शांत सानिध्यात फेरफटका मारणे,अगदी “मै ओर मेरी तनहाई अक्सर बाते करेंगे”च्या स्टाईलमध्ये “डोंट डिस्टर्ब”चा बोर्ड न लावताही मिळणारा एकांत, बाजूला मंद,अलवार,हळू आवाजात ऐकू येणारे पण ह्रदयाला भिडणारे संगीत, ती अर्थपूर्ण हिंदीमराठी गाणी,स्वतःमध्ये रमुन जाण्याचे क्षण ह्याला मी नक्कीच अग्रक्रम देईन. बघूया आपली बकेटलिस्ट बनवून ठेवायला तरी हरकत नाही.

©  सौ.कल्याणी केळकर बापट

9604947256

बडनेरा, अमरावती

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “डिसेंबर अर्थात मार्गशीर्ष…” ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

सौ कल्याणी केळकर बापट

? विविधा ?

☆ “डिसेंबर अर्थात मार्गशीर्ष…” ☆ सौ कल्याणी केळकर बापट

इंग्रजी डिसेंबर महिन्याची सुरवात आणि मराठी मार्गशीर्ष नुकताच लागलेला, म्हणजे आनंददायी, उत्साहवर्धक वातावरण.मस्त हवीहवीशी गुलाबी थंडीची सुरवात असते.ह्या थंडीला गुलाबी विशेषण देणा-या रसिकाला सँल्युट. ह्या दिवसात हवामान एकदम मस्त, दुधदभतं, फळफळावळ,भाजीपाला ह्यांची रेलचेल. दिवसभर भरपूर उत्साहाने काम करायचं मग आपल्या सुखाच्या,हक्काच्या झोपडीत परतायचं,रात्री मस्त मऊमऊ ,उनउनं खिचडी, गरमागरम टोमॅटो चं सूप ओरपायचं आणि मग मस्त दिवसभराच्या दगदगीनं मस्त मऊमऊ गोधडीत अवघ्या काही मिनीटातच निद्रादेवीच्या अधीन व्हायचं, खरचं सुखं, सुखं म्हणतात ते हेच,आपल्यापाशीच असतं फक्त आपल्याला हुडकून त्याच्या आस्वाद घेता यायला हवा.

मार्गशीर्ष मास वा डिसेंबर महिना हे धार्मिक दृष्टीने पण खूप महत्त्वाचे, मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार,चंपाषष्ठी,दत्तजयंती ह्याच काळातील.

मार्गशीर्ष शुद्ध षष्ठी ही तिथी चंपाषष्ठी म्हणून साजरी केली जाते. या दिवशी वांग्याचे भरीत आणि भाकरी यांचा नैवेद्य करून देवाला दाखवितात. तसेच या नैवेद्याचा काही भाग कुत्र्यांना त्यांची पूजा करून वाढतात. मार्गशीर्ष महिन्यातल्या पहिल्या दिवशी मल्हारी नवरात्र सुरू होते. मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेपासून शुद्ध षष्ठीपर्यंत हे चंपाषष्ठीचे सहा दिवसांचे नवरात्र असते. जेजुरीला हा उत्सव खूप मोठ्या प्रमाणात व भक्तिभावाने साजरा होतो. कुलाचाराप्रमाणे पूजेत सुघट व टाक असतात. नवरात्राप्रमाणेच रोज माळा वाढवत घाटावर लावायच्या असतात. सहा दिवस नंदादीप लावतात.

मार्गशीर्ष शुद्ध षष्ठी या तिथीची देवता खंडोबा किंवा मल्लारी ही आहे . मणी-मल्ल या दोन दैत्यांचा पराभव करून खंडोबाने लोकांना संकट मुक्त केले. या घटनेचे स्मरण म्हणून हा उत्सव करतात . मार्गशीर्ष महिन्याचा पहिलाचा दिवस म्हणजे देवदीपावली किंवा मोठी दिवाळी. मुख्यत: चित्तपावनांमध्ये कुलदैवत, ग्रामदैवत यांना आळवण्याचा हा दिवस. चित्तपावनांमध्ये त्या दिवशी प्रामुख्याने वडे-घारग्यांचा किंवा आंबोळीचा नैवेद्य असतो. प्रत्येक कुटुंबानुसार नैवेद्यांची संख्या वेगळी असते. गावातील मुख्य देवता, इतर उपदेव-देवता महापुरुष, वेतोबा, ग्रामदेवता इत्यादींना हे नैवेद्य दाखवले जातात. त्याचबरोबर काही कुटुंबांत पितरांसाठीही वेगळा नैवेद्य बाजूला काढून ठेवतात. त्यामुळे नैवेद्याच्या पानांची संख्या सतरा, चोवीस, नऊ अशी कोणतीही असते.

लगेच येणारा उत्सव म्हणजे दत्तजयंती चा उत्सव.मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी मृग नक्षत्रावर सायंकाळी दत्ताचा जन्म झाला, म्हणून त्या दिवशी दत्ताचा जन्मोत्सव सर्व दत्तक्षेत्रांत साजरा होत असतो. पूर्वीच्या काळी भूतलावर स्थूल व सूक्ष्म रूपांत आसुरी शक्ती मोठ्या प्रमाणावर वाढल्या होत्या. त्यांना दैत्य म्हटले जात असे. देवगणांनी त्या आसुरी शक्‍तींना नष्ट करण्यासाठी केलेले प्रयत्न असफल झाले. तेव्हा ब्रह्मदेवाच्या आदेशानुसार वेगवेगळया ठिकाणी वेगवेगळया रूपांत दत्त देवतेला अवतार घ्यावा लागला. त्यानंतर दैत्य नष्ट झाले. तो दिवस `दत्तजयंती’ म्हणून साजरा करतात.

दत्तजयंतीला दत्ततत्त्व हे पृथ्वीतलावर नेहमीच्या तुलनेत १००० पटीने कार्यरत असते. या दिवशी दत्ताची मनोभावे उपासना केल्यास दत्ततत्त्वाचा जास्तीतजास्त लाभ मिळण्यास मदत होते.

दत्तजयंती साजरी करण्यासंबंधाने शास्त्रोक्त असा विशिष्ट विधी आढळून येत नाही. या उत्सवापूर्वी सात दिवस गुरुचरित्राचे पारायण करण्याचा प्रघात आहे. यालाच गुरुचरित्रसप्ताह असे म्हणतात. दत्तमंदिरामध्ये भजन, कीर्तनादी कार्यक्रम आयोजीत केले जातात. दत्तगुरूंची पूजा, धूप, दीप व आरती करून सुंठवड्याचा प्रसाद वाटप करतात. दत्ताच्या हातातील कमंडलू व जपमाळ ब्रह्मदेवाचे प्रतीक आहे. शंख व चक्र विष्णूचे आणि त्रिशूळ व डमरू शंकराचे प्रतीक आहे. महाराष्ट्रात औदुंबर, नरसोबाची वाडी, गाणगापूर इत्यादी दत्तक्षेत्रांत या उत्सवाला विशेष महत्त्व असतं. बडने-या जवळ “झिरी”येथे.दत्तमहाराजांचे जागृत देवस्थान आहे.

असा हा हवाहवासा मार्गशीर्ष व डिसेंबर महिन्याच्या शुभेच्छा.

©  सौ.कल्याणी केळकर बापट

9604947256

बडनेरा, अमरावती

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ उगवतीचे रंग – अभिव्यक्ती स्वातंत्र्य… ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्री विश्वास देशपांडे

? विविधा ?

☆ उगवतीचे रंग – अभिव्यक्ती स्वातंत्र्य… ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमाला गेलो होतो. जेव्हा प्रमुख वक्त्यांचे भाषण सुरु झाले तेव्हा त्यांनी मर्यादा सोडून बोलणाऱ्या आजच्या राजकारण्यांवर टीका केली. खरोखरच राजकीय नेते म्हणजे लोकांनी निवडून दिलेले प्रतिनिधी असतात. त्यांनी जबाबदारीने बोलायला हवे. पण त्याचे भान काही अपवाद सोडले तर आज कुठेही दिसत नाही. ते उपरोधिकपणे म्हणाले ‘ विद्या विनयेन शोभते ‘ असे एक संस्कृत सुभाषित आहे. पण बोलणाऱ्यानी एवढी खालची पातळी गाठली आहे की ते म्हणतील, ‘ ही कोण आणि कुठली विद्या ? कुठला विनय ? ‘ रोजच्या बातम्या पाहिल्या आणि त्यात राजकारण्यांनी केलेली विधाने पाहिली की याचे प्रत्यंतर येते. बातम्या सुद्धा बघू नये असे सुजाण नागरिकांना वाटत असल्यास नवल नाही.

याच व्यासपीठावरून आणखी एक वक्त्या बोलल्या. त्यांनी बोलताना स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल एक विधान केले. त्या म्हणाल्या, ‘ सुरुवातीला मला सावरकरांबद्दल प्रचंड आदर होता पण आता तो कमी झाला आहे. ‘ त्याचे कारण त्यांनी सांगितले की राहुल गांधी जर सातत्याने सावरकरांवर टीका करत असतील, तर त्यांच्या हातात काहीतरी पुरावे असल्याखेरीज ते तसे बोलणार नाहीत.  आणखी एक वक्ते उभे राहिले ते म्हणाले की या बाई बोलल्या त्यात नक्कीच तथ्य आहे. आपल्याला सावरकरांच्या विरोधात कोणी बोललेलं आवडत नाही कारण तशा प्रकारची विधानं त्यांच्याबद्दल आपण ऐकलेली नसतात. पण म्हणून ते खोटं आहे असं मानायचं कारण नाही. महात्मा गांधींनी आपण केलेल्या चुकांची कबुली ‘ माझे सत्याचे प्रयोग ‘ या पुस्तकात दिली आहे. अशी कबुली देण्यासाठी फार मोठे मन लागते. याच व्यासपीठावरून मग दाभोलकर, पानसरे आणि गौरी लंकेश यांनी विरोधाची भूमिका घेतली म्हणून त्यांची हत्या करण्यात आली. अभिव्यक्ती स्वातंत्र्य नाही का ? देश धार्मिक हुकूमशाहीकडे, फॅसिस्ट वादाकडे झुकतो आहे अशी विविध विधाने केली गेली.

दाभोळकर, पानसरे किंवा गौरी लंकेश यांच्या हत्येचे समर्थन कोणीच करणार नाही आणि करू नये. कोणी वेगळी भूमिका मांडली तर त्यांची हत्या करणे हे कधीच समर्थनीय ठरू शकत नाही. ती निषेधार्हच गोष्ट आहे.

विशेष म्हणजे सावरकरांबद्दल वरीलप्रमाणे विधाने करणाऱ्या  व्यक्ती या जेष्ठ साहित्यिक किंवा सामाजिक कार्य करणाऱ्या होत्या. त्यांच्याकडून अशा प्रकारची विधाने ऐकणे हे आश्चर्यचकित करणारे आणि धक्कादायक वाटले. उथळ विधाने करणारी आणि सावरकरांच्या जीवनकार्याचा फारसा अभ्यास न करणारी एखादी व्यक्ती सावरकरांच्या विरोधात बोलते म्हणून तिचे म्हणणे खरे मानून सावरकरांचा त्याग, देशभक्ती या सगळ्याच गोष्टींवर बोळा फिरवायचा का याचा बोलणाऱ्यांनी विचार करायला हवा. महात्मा गांधींनी आपल्या ‘ माझे सत्याचे प्रयोग ‘ या आत्मचरित्रात आपण केलेल्या चुकांची कबुली दिली आहे म्हणून ते महान होत नाहीत किंवा सावरकरांनी स्वतःच्या चुकांबद्दल असे काही लिहिले नाही म्हणून ते लहान होत नाहीत. सावरकर,गांधी, नेहरू, सरदार पटेल, डॉ आंबेडकर, म. फुले  यांच्यासारख्या व्यक्ती मुळात महान आहेत. या सगळ्या महापुरुषांनी आपल्या जीवन कार्यातून काय संदेश दिला हे माझ्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे आहे.

अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली हल्ली कोणीही काहीही बोलावे असे झाले आहे. ज्यावेळी एखाद्या सार्वजनिक कार्यक्रमात किंवा समारंभात आपण भाषण करतो, तेव्हा लोकांपुढे कोणता आदर्श ठेवायचा हा खरंतर ज्याचा त्याचा प्रश्न आहे पण ज्यावेळी आपण महापुरुषांबद्दल बोलतो, त्यावेळी त्यांचे दोषदिग्दर्शन न करता त्यांच्या गुणांवर आपण लक्ष केंद्रित केले पाहिजे असे मला वाटते. गुणग्राहकता आपल्याजवळ असली पाहिजे. महापुरुष हे देखील शेवटी माणसेच असतात. त्या त्या परिस्थितीत निर्णय घेताना त्यांच्या हातून कदाचित काही चुका होऊ शकतात. पण म्हणून त्यांच्या महत्वाच्या कार्याकडे दुर्लक्ष करून त्यांचे दोष किंवा चुकाच आपण दाखवत राहायच्या हे कितपत योग्य आहे ? अलीकडे महापुरुषांच्या कार्याचे, गुणांचे गुणगान करण्यापेक्षा त्यांच्यातील दोष दाखवण्याचा जो पायंडा पडत चालला आहे, तो भविष्यकाळाच्या दृष्टीने घातक आहे. पुढच्या पिढ्यांसमोर आपण आदर्श ठेवायचा की दोष दिग्दर्शन करायचे ? स्वा. सावरकर असोत, गांधी किंवा नेहरू असोत या सगळ्या महापुरुषांनी देशासाठी प्रचंड त्याग केला आहे, अपार कष्ट, तुरुंगवास सोसला आहे. अमुक एका महापुरुषावर टीका केली म्हणजे तो लहान होत नाही किंवा त्याच्या कार्याचे महत्व कमी होत नाही.

पुलं हे महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व. पुलंनी अवघ्या महाराष्ट्राला सुसंस्कृत विनोद कसा असतो हे दाखवून दिले. नाट्य, संगीत, अभिनय, दिग्दर्शन, लेखन इ कलेच्या विविध प्रांतात सहज संचार करणारा अवलिया म्हणजे पुलं. याच पुलंवर मध्यंतरी एक चित्रपट येऊन गेला. ‘ भाई -व्यक्ती आणि वल्ली ‘ या नावाचा. आपल्यापैकी बऱ्याच पुलं प्रेमींनी तो पाहिला असेल. पण या चित्रपटातून पुलंचे अष्टपैलू व्यक्तिमत्व समोर येण्याऐवजी सतत धूम्रपान करणारे, मद्यपान करणारे पुलं अशीच व्यक्तिरेखा डोळ्यासमोर येते. कदाचित वस्तुस्थिती तशी असेलही आणि दिग्दर्शकाला काय दाखवायचे याचे स्वातंत्र्यही नक्कीच आहे. पण इथे पुन्हा माझ्यातील शिक्षक जागृत होतो. समाजापुढे आपण काय ठेवतो आहोत याचा विचार नक्कीच करायला हवा असे मला तीव्रतेने वाटते. वाईट गोष्टी लगेच उचलल्या जातात. चांगल्या गोष्टी रुजवायला वेळ लागतो. उतारावरून गाडी वेगाने खाली येते. वर चढण्यासाठी कष्ट पडतात. आपल्याला समाजाची गाडी प्रगतीच्या दिशेने न्यायची असेल तर योग्यायोग्यतेचा विवेक ठेवायलाच हवा. अर्थात  माझे हे विचार आहेत. सगळ्यांनाच आवडतील असेही नाही याची जाणीव मला आहे. प्रत्येकाला  अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहेच !

पण जाता जाता आणखी एक सुदंर सुभाषित सांगून समारोप करू या. या सुभाषितात सुभाषितकार म्हणतो

 विद्या ददाति विनयं, विनयाद याति पात्रतां ।

 पात्रत्वात धनमाप्नोति, धनात धर्मं तत: सुखम ।।

ज्या व्यक्तीला खरोखरीच ज्ञानप्राप्ती झाली आहे, अशी व्यक्ती विनयशील म्हणजे नम्र असते. कुठे कसे वागावे हे अशा व्यक्तीला सांगावे लागत नाही. विनम्रतेतून योग्यता किंवा पात्रता अंगी येते. त्यातूनच मग धनाची प्राप्ती करण्यायोग्य व्यक्ती होत असते. धनाचा उपयोग करून मनुष्य धार्मिक कार्य संपन्न करू शकतो आणि त्यातूनच त्याला आनंद प्राप्त असतो. या सगळ्या गोष्टी एकमेकांशी संबंधित आहेत. यात अर्थातच ज्ञानप्राप्तीचे आणि त्या खऱ्या ज्ञानप्राप्तीतून अंगी येणाऱ्या गुणांचे महत्व अधोरेखित केले आहे.

© श्री विश्वास देशपांडे,

चाळीसगाव

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ अंगाई… ☆ सौ.मंजिरी येडूरकर ☆

सुश्री मंजिरी येडूरकर

?  विविधा ?

अंगाई… ☆ सौ.मंजिरी येडूरकर ☆

अंगाई हा शब्द कसा आला असेल? खूप विचार केला. अगदी आपल्या गुगल गुरूला पण विचारलं. काही पत्ता लागला नाही. मीच उत्तर मिळवायचा प्रयत्न केला. पूर्वी ‘ गायी गं गायी, माझ्या बाळाला दूध देई ‘ असं म्हणायचे. म्हणजे बाळाच्या परिचयाच्या दोन्ही गोष्टी असणार. गोठ्यात गाय असणार आणि दूध ती देते हे बाळानं पाहिलं असणार.  बाळ रडायला लागलं की त्याची समजूत या गाण्यानं काढली जात असेल व गायी बद्दल आदर लहानपणीच निर्माण होत असेल. नंतर हळू हळू गोठे, गायी काळाच्या उदरात गडप झाल्या. नंतर ते गाणं ‘ गाई  गं अंगाई ‘ असं झालं. त्याचा अर्थ असा लावला गेला असेल की बाळाला, गाई म्हणजे झोप, ती येण्यासाठी गायलं गेलेलं गाणं म्हणजे अंगाई! ही आपली मी माझी काढलेली भाबडी समजूत! पण हे नक्की की आई व्हायचं झालं तर त्या मुलीला अंगाई म्हणता आली पाहिजे असा अलिखित नियम होता. होता म्हणते आहे कारण आज काल आईच्या मदतीला मोबाईल नामक मैत्रीण येते. अंगाई म्हटलं की एक शांत, सौम्य, सोज्वळ गाणं लागतं. अजूनतरी हं ! पुढची पिढी कदाचित ‘ आवाज वाढव डी जे ‘ सारखी गाणी लावतील सुद्धा! कारण तोपर्यंत मुलांना नाजूक आवाजातली गाणी ऐकू येणं बंदही झालं असेल, त्यांनाही मोठ्ठया आवाजातली गाणीच आवडायला लागतील.

मुलांना झोपवताना गाणं म्हणायची पद्धत खूप जुनी असावी. जसं जात्यावर बसलं की ओवी सुचते. तसं बाळ मांडीवर आलं की अंगाई सुचते. ओवी गाण्यासाठी जसं चांगला आवाज किंवा संगीतातील ज्ञान असावं लागत नाही तसंच अंगाईलाही! आपल्याकडे अजून लहान मुलांना झोपताना ऐकवायच्या ट्यूनची खेळणी आली नव्हती, त्या काळात मी लंडनला मला नात झाली म्हणून गेले होते. नातीसाठी तशी म्युझिकवाली खेळणी आणली होती. पण ती रडायला लागली की एवढ्या मोठ्ठयांदा रडायची की त्या खेळण्याचा आवाज कुठे ऐकूच यायचा नाही. मग पारंपारिक मोठ्या आवाजात ‘ हात हात गं चिऊ, हात हात गं काऊ ‘ अशी गाणी किंवा ओरडावं  लागायचं. मला त्यावेळी वाटलं की इंग्रज लोकांच्यात अंगाई गाण्याची परंपराच नसावी. त्यामुळं हे संगीत ऐकवण्याची पद्धत पडली असावी. पण तसं नाही म्हणे! तिथे बाळ आई वडिलांजवळ झोपतच नाहीत. बाळ हे बाळ असल्यापासून त्याची बेडरूम वेगळी असते. त्यामुळं बाळ रडलं तरी आईने जवळ घेण्याचा किंवा अंगाई गाण्याचा प्रश्नच येत नाही. म्हणून ते म्युझिक!

आपल्याकडच्या परंपरा जरा माणसाच्या मानसिक गरजा बघून बनवल्या आहेत असं म्हणायला काही हरकत नाही. केवळ आपलंच कुटुंब नाही तर सगळा समाजच एकत्र बांधून ठेवणाऱ्या प्रथा आहेत.

स्पर्शात ओलावा असतो, तो शब्दात मिळणं सुध्दा अवघड आहे. स्पर्शात प्रेम असतं, आधार असतो, आता कशाचीही भिती नाही हा विश्वास असतो. हा विश्वास लहान बाळांना देण्यासाठी मांडी, कूस, पदर, बाळाशी केलेला संवाद यागोष्टी महत्त्वाच्या असतात. आपल्याकडे लहान बाळांना बोललेलं सगळं कळतं असं आपण समजतो. बाळ जन्माला आल्यावरच असं नाही तर अभिमन्यू  सारखे गर्भातही संस्कार होतात हा आपला विश्वास आहे. जिजाऊ यांनी तर शिवाजीला वीरश्रीने भरलेल्या गोष्टी ऐकवल्या, अंगाई ऐकवली आणि तो  शूरवीर झाला.    आपल्या सामान्य माणसांच्या अंगाई मध्ये चिऊ, काऊ, झाडं, चंदामामा अशी निसर्गाची ओळख असते.अंगाई वरून एक गम्मत आठवली. माझ्या दुसऱ्या मुलाला मुलगा झाला. तो जरा रडवाच होता. माझा मुलगा जरा जास्तच हळवा त्यामुळं तो रडायला लागला की हा कासावीस व्हायचा. त्याला तर  मराठी गाणी, अंगाई असं काही म्हणायला येत नव्हतं. हिंदी सिनेमातली गाणी यायची पण प्रेमाची नाहीतर विरहाची! ही सोडून एक गाणं त्याला यायचं, ते कुठलं सांगू?  ‘हमारीही मुठ्ठीमे आकाश सारा ‘ आणि तो हेच गाणं म्हणून मुलाला झोपावयाचा. मला खूप उत्सुकता आहे, तो नातू पुढे मोठ्ठा झाल्यावर कोण बनेल, कोणतं कर्तुत्व गाजवेल याचं!

आपल्याकडे एक जगावेगळी आई होऊन गेली, मदालसा! अंगाई चा विषय निघाल्यावर मदालसा चा उल्लेख व्हायलाच हवा. एकमेव आई जिने अंगाई तून मुलांना अध्यात्माचे धडे दिले. असं कां, हे कळण्यासाठी तिची गोष्ट थोडक्यात सांगावीच लागेल. ही ऋतूध्वज राजाची राणी ! पातालकेतू राक्षसाच्या मायावी कृत्यामुळे तिने मृत राजा पाहिला, आणि अग्निकाष्ठ भक्षण करून देह विसर्जित केला. राजा अतिशय दुःखी झाला. त्याला वैराग्य प्राप्त झाले. अजून राजाला मूलबाळ ही नव्हते, राज्यकारभार कोण पाहणार? मग कंबल व अश्र्वतल या नागऋषींनी शिवाराधना करून तशीच दुसरी मदालसा प्राप्त करून घेतली. ती शिवाचा अंश असल्यामुळे वैराग्यशील होती. अगदी नाईलाज म्हणून संसार यात्रा आक्रमू लागली. पहिल्या मुलाच्या नामकरणाच्या वेळी ती म्हणाली, नश्वर देहाला नाव कशाला ठेवायचे, मृत्तिका व शरीर दोघांची योग्यता सारखीच.राजाने तिला नामकरण व आत्मोन्नत्ती याची माहिती दिली, पण परिणाम उलटाच झाला. मुलांनी राज्यशकट हाकण्यापेक्षा आत्मोद्धार करावा म्हणून ती निवृत्ती विषयक, आध्यात्मपर अंगाई गात असे. त्याचा साधारण अर्थ असा – ‘सुबाहू उगा रडून शिणू नकोस, पूर्व जन्मीच्या संचितानेच या मायाजालात अडकलास, सावध हो, डोळे मिटून घे पण झोपू नकोस, दृष्टी प्रभुकडे ठेव, अज्ञानाने तू भवबंधनात अडकला आहेस, पण आत्मा मुक्त असतो, ही मायेची बंधने तुटणे कठीण आहे, सावध हो.’

या पुढे जाऊन ती विश्व निर्मितीची क्रिया, मायेचे पाच उद्गार, पंचतत्वे , पंचवायू, पंचेंद्रिये, पाच कर्मेंद्रिये, पाच अवस्था, जड देह, लिंग देह, शरीर रचना, सर्व नाड्या व शटचक्रांची माहिती सांगते. पुढे नाडी जागृत करणे, आत्मज्योतीचे दर्शन, मोक्ष यांचीही माहिती देते. परिणामी सुबाहू, शत्रुमर्दन, शुभकिर्ती ही तिन्ही मुले राजवैभवाचा त्याग करून अरण्यात जातात. शेवटच्या  अलर्क या मुलाच्या वेळी राजा तिची मनधरणी करतो त्यामुळे ती अलर्क ला राजनीतीचे पाठ देते, पुढे तो अनेक वर्षे राज्य करतो. ज्यावेळी तो लढाईत हरतो त्यावेळी आईने जपून ठेवण्यासाठी दिलेले पत्र वाचतो, त्या पत्राप्रमाणे तो सह्याद्री पर्वतावर श्री दत्त प्रभुंच्याकडे जातो, त्यांचा अनुग्रह प्राप्त करून मुक्त होतो. मदालसाने ‘ माझ्या पोटातला गर्भ, कुण्या दुसऱ्या आईच्या पोटात जाणार नाही ‘ अशी प्रतिज्ञा केली होती. त्याप्रमाणे तिने तिन्ही मुलांना मुक्तीमार्ग दाखवला. ज्ञानेश्वरांनी लिहिलेले मदालसेचे अभंग म्हणजेच तिच्या अंगाईचे भाषांतर!

एकूण सांगायची गोष्ट अशी की हा आपला विश्वास आहे की अगदी लहानपणापासून आपण बाळांना जे सांगतो, जे शिकवतो ते ती आत्मसात करतात. त्यालाच आपण ‘ बाळकडू ‘ म्हणत असू.

आपण असं कितीही मानलं तरी याला कितीतरी अपवाद असल्याचं आपल्या लक्षात येतं. बाळ मोठ्ठं झाल्यावर कसं निपजेल हे सांगता येत नसलं तरी हे खरं आहे की आई आणि बाळ यांच्यात एक स्पर्शाचं नातं असतं, एक हळुवार नातं असतं, हे नाजूक बंध जास्त दृढ होतात, जेंव्हा आई त्याला आपल्या हाताने न्हाऊ, माखू घालते, चिऊ काऊ चे घास भरवते. मातृत्वाचं जे सुख असतं ते बाळाच्या बाललीलात, बालसंगोपनात ओतप्रोत भरलेलं असतं. हे संगोपन परक्याच्या हातात सोपवून, जन्माला आल्याबरोबर स्वतंत्र बेडवर, स्वतंत्र बेडरूम मध्ये झोपवून, आई या मातृसुखाला पारखी होत नसेल? कदाचित बाळ त्यामुळं धीट, स्वावलंबी आपल्या बाळापेक्षा लवकर होत असेल पण अशा बाळाला  जन्मदात्रीशी सांधणारा दुवा निर्माणच होत नसेल तर तो दुवा इतर कुठल्याही नात्याला सांधण्यासाठी निर्माण होणार नाही. त्यामुळं माणूस नुसता एकटा पडत नाही तर तो कोरडाही होतो. अर्थात ही आपल्या पिढीची मतं झाली. पुढच्या पिढ्या पाश्चिमात्य संस्करावर, विज्ञानातील प्रगतीवर  जोपासल्या जाणार आहेत. त्यामुळं जन्माला आल्यापासून मोबाईल किंवा त्याचं दुसरं एखादं व्हर्जन बघत बघत झोपतील, आईची किंवा अंगाईची गरज संपलेली असेल. असो, कालाय तस्मैनमः|

© सौ.मंजिरी येडूरकर

लेखिका व कवयित्री, मो – 9421096611

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ अचूक शब्द… ☆ सुश्री विभावरी कुलकर्णी ☆

सुश्री विभावरी कुलकर्णी

🌸 विविधा 🌸

☆ अचूक शब्द… ☆ सुश्री विभावरी कुलकर्णी ☆

मला एक लहानपणी ऐकलेली गोष्ट नेहेमी आठवते. एक कोळी असतो. रोज मासेमारी करुन आपला चरितार्थ चालवत असतो.आणि एका झोपडीत रहात असतो. त्याची बायको पण कष्ट करत असते.पण तिचा दैव,भाग्य यावर जरा रोषच असतो. कोळी आहे त्यात समाधानी असतो व मिळेल त्या साठी देवाचे आभार मानत असतो. शक्य तितके परोपकार करत असतो. बरेच दिवस दोघे प्रार्थना करत असतात. एक दिवस प्रार्थना सफल होते आणि एक दैवी शक्ती समोर येते आणि म्हणते तुमच्या तीन इच्छा मी पूर्ण करेन. काय इच्छा आहेत ते सांगा. कोळी म्हणतो आम्हाला भरपूर घरभर मासे पाहिजेत. त्याच क्षणी त्याची इच्छा पूर्ण होते. तो आनंदून जातो. तितक्यात त्याची अविचारी बायको म्हणते “इतके मासे माझ्या नाकाला चिकटवू का” त्याच क्षणी सगळे मासे तिच्या नाकाला चिकटतात. नाईलाजाने ते तिसरी इच्छा मागतात “हे सगळे मासे गायब होऊ दे.” योग्य विचार व योग्य शब्द याचा वापर न केल्या मुळे सगळे वर वाया गेले.

अजून एक गोष्ट लक्षात आहे.आणि ती फार आवडती आहे. एक अंध भिकारी असतो.अनेक वर्षे एका मंदिराच्या बाहेर बसत असतो. त्यालाही एक दैवी शक्ती प्रसन्न होते आणि एकच वर माग असे सांगते. त्याने मागितलेला वर सर्वांनी लक्षात घेण्या सारखा आहे. त्यात त्याची हुशारी व अचूक शब्द दिसतात.जणू ते शब्द म्हणजे आपल्याला शिकवण आहे. त्याचे मागणे असे असते, माझा खापर पणतू राजाच्या गादीवर बसलेला बघायचा आहे.

एकाच वरात त्याने किती इच्छा व्यक्त केल्या.असे अचूक शब्द वापरायला शिकले पाहिजे.

प्रत्येक शब्दाला त्याचे वलय असते. शब्दातून स्पंदने बाहेर पडतात. आणि तिच आपल्या भोवती असतात.   म्हणूनच शब्द योग्य व जपून वापरावेत. शब्दांमध्ये खूप ताकद असते. आपल्या घरातील मोठी माणसे नेहेमी सांगत असतात. शब्द जपून वापरा.सकारात्मक वापरा. समजा आपण ज्या व्यक्ती विषयी अपशब्द वापरतो किंवा राग,चिड व्यक्त करतो ते ऐकायला ती व्यक्ती समोर  नसेल किंवा त्या व्यक्तीने ते स्वीकारलेच नाहीत तर काय होईल. भिंतीवर चेंडू टाकल्या सारखे होईल. तो चेंडू भिंतीने न स्वीकारल्या मुळे पुन्हा आपल्यालाच लागेल. तसेच शब्दांचे असते.

म्हणून मंत्रे,स्तोत्रे,जप याला व त्यातील शब्दांना महत्व असते. त्यामुळे सकारात्मक व अचूक शब्दांची निवड महत्वाची असते.

वैश्विक,दैवी शक्ती देत असते.फक्त आपल्याला योग्य शब्दात सांगता यायला हवे. योग्य शब्दांवर फोकस करता यायला हवे. या साठी वैचारिक परिपक्वता,चांगले विचार,परोपकार अशी वृत्ती असायला हवी. तरच आपली योग्य ध्येयाकडे वाटचाल होते.

© सुश्री विभावरी कुलकर्णी

३०/११/२०२३

हिलिंग, मेडिटेशन मास्टर, समुपदेशक.

सांगवी, पुणे

📱 – ८०८७८१०१९७

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ आठवणींचा त्रिपूर…! ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

? विविधा ?

☆ आठवणींचा त्रिपूर…! ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

आज त्रिपुरी पौर्णिमा! दसरा- दिवाळीपासून सुरू झालेल्या सर्व सणांची सांगता या त्रिपुरी पौर्णिमेने होते! त्रिपुरी पौर्णिमा आली की डोळ्यासमोर आपोआपच आठवणींचा त्रिपुर उभा राहतो!

तेलाच्या पणत्यांनी उजळलेली असंख्य दिव्यांची दीपमाळ दिसावी तसा हा आठवणींचा त्रिपुर डोळ्यासमोर येतो. लहानपणी त्रिपुर पाहायला संध्याकाळी सर्व देवळातून फिरत असू! वर्षभर उभी असलेली दगडी त्रिपुर माळ उजळून गेलेली दिसत असे.गोव्यातील तसेच कोकणातील देवळातून अशा दीपमाळा मी खूप पाहिल्या..

त्रिपुरासूर नावाच्या राक्षसाने खडतर तप करून ब्रह्मदेवाकडून शत्रूंपासून भय राहणार नाही,असा वर मागून घेतला.या वरामुळे उन्मत्त होऊन तो सर्व लोकांना व देवांना मुद्दाम खूप त्रास द्यायला लागला. त्रिपुरासुराची तीन नगरे असून त्याला अभेद्य तट होता. त्यामुळे देवांनाही त्याचा पराभव करता येईना .देवांनी भगवान शंकराची प्रार्थना केली, तेव्हा शंकरांनी त्रिपुरासुराची तिन्ही नगरे जाळून त्याला ठार केले. कार्तिकी पौर्णिमेच्या दिवशी ही घटना घडल्यामुळे तिला त्रिपुरारी पौर्णिमा असे म्हटले जाऊ लागले.

या दिवशी घरात, घराबाहेर व देवळातही दिव्यांची आरास करून पूजा केली जाते. तसेच नदीत दीपदान करून लोक आनंदोत्सव साजरा करतात. एकादशी पासून सुरू झालेले तुळशी विवाह करण्याचा हा शेवटचा दिवस असतो. बौद्ध आणि शीख धर्मातही या दिवसाचे विशेष महत्त्व आहे.

पण….. माझ्यासाठी ही त्रिपुरी पौर्णिमा मोठी भाग्याची होती बहुतेक! कारण यांचा जन्म त्रिपुरी पौर्णिमेला झाला. सासुबाई सांगत, “समोर देवळात त्रिपुर लावून आले आणि मग यांचा जन्म झाला.” त्याकाळी जन्म वेळ अगदी परफेक्ट नोंदली जाण्याची शक्यता कमी असे, पण यांचा जन्म त्रिपुरी पौर्णिमेच्या संध्याकाळी झाला एवढे मात्र खरे! त्यामुळे लग्नानंतर तारखेपेक्षा त्रिपुरी पौर्णिमेला यांचा वाढदिवस साजरा केला जाई!

सांगलीला आमच्या घरासमोर असलेल्या मारुती मंदिरात संध्याकाळी त्रिपुर लावण्यात माझे धाकटे दीर आणि मुले यांचा पुढाकार असे. आम्ही सर्वजण पणत्या, मेणबत्ती घेऊन त्रिपुर लावण्यास मदत करत असू. मंदिराचे सौंदर्य पणत्यांच्या प्रकाशाने उजळून गेलेले पाहण्यात आम्हाला खूप आनंद मिळत असे. या काळात आकाश साधारणपणे निरभ्र असे.शांत वातावरणात वाऱ्याची झुळूक आणि गारवा असला तरी पणत्या तेवण्यासाठी योग्य हवा असे. सगळीकडे निरव शांतता आणि अंधार असताना ते दिवे खूपच उजळून दिसत! अगदी बघत राहावे असे!

प्रत्येक सण आपले वैशिष्ट्य घेऊन येतो. तसा हा त्रिपुरी पौर्णिमेचा दिवस! यानंतर थंडीचे दिवस ऊबदार शालीत गुरफटून घेत डिसेंबर, जानेवारी येतात., पण बरेचसे मोठे सण संपलेले असतात. संक्रांतीचे संक्रमण सोडले तर फाल्गुनातील होळी आणि चैत्र पाडव्यापर्यंत सर्व निवांत असते.

ह्यांच्या आयुष्याचा एक एक त्रिपुर पूर्ण होत असताना मनाला खूप आनंद होतो! या त्रिपुरी पौर्णिमेच्या आनंदात आम्ही परिपूर्ण जीवन जगलो, असेच आनंदाचे, आरोग्याचे टिपूर चांदणे ह्यांना कायम मिळो हीच परमेश्वर चरणी प्रार्थना! जीवेत शरदः शतम्!

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

पुणे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ माधव ज्युलियन : स्मृतिदिनानिमित्त – “माधव ज्युलियन…” ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

सौ कल्याणी केळकर बापट

? विविधा ?

☆ माधव ज्युलियन : स्मृतिदिनानिमित्त 🌼 “माधव ज्युलियन…” ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

वाचनाची गोडी लागल्यामुळे मराठी मधील अनेक उत्तमोत्तम साहित्य वाचनात आले ह्याचा आनंद हा आहेच, परंतू वेळेअभावी म्हणा किंवा अन्य काही कारणांमुळे मराठी सोडून इतर भाषांमधील साहित्याचा फारसा आस्वाद घेता आला नाही ह्याचं शल्य अजुनही मनात हे आहेच. असो

मराठी वाचतांना ऐतिहासिक, पौराणिक कथा, कादंबऱ्या, कविता ह्यांचे वाचन झपाटल्यागत सूरु झाले आणि मग ही गोडी वाढता वाढता वाढतच गेलीं. कविता वाचत असताना काही कविता हया मनात आणि हृदयात कायमच्या विराजमान झाल्यात त्या कवितांपैकी एक कविता, “प्रेमस्वरूप आई, वात्सल्य सिंधू आई”. प्रथम ही कविता माधव ज्युलियन ह्याची आहे हे कळल्यावर हे कवी महाशय आधी अमराठी असेच वाटले आणि पुढे त्यांच्याबद्दल माहिती घेतल्यावर मग माझे अज्ञान दूर झाले.

माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन ह्यांचा जन्म 21 जानेवारी बडोद्याला झाला होता. हे मराठी भाषेतील कवी, रविकिरण मंडळाचे संस्थापक व सर्वांत यशस्वी सदस्य होते. ते फारसी आणि इंग्रजीचे प्राध्यापक होते. माधवराव पटवर्धन हे मुंबई विद्यापीठाच्या मराठी साहित्यातील पहिल्या डी. लिट. पदवीचे मानकरी आहेत. इंग्लिश कवी शेले याने रचलेल्या ज्यूलियन आणि मडालो या कवितेवरून यांनी “जूलियन” असे टोपणनाव धारण केले. गझल व रुबाई हे काव्यप्रकार फारसीतून मराठीत प्रथम आणण्याचे श्रेय माधवराव पटवर्धनांना देण्यात येते. माधव ज्युलियनांनी दित्जू, मा. जू. आणि एम्‌. जूलियन या नावांनीही लिखाण केले आहे. त्यांनी कविवर्य भा. रा. तांबे यांच्या कवितांचे संकलन आणि संपादन केले आहे. उत्कृष्ट संपादनाचा हा एक नमुना मानला जातो. पटवर्धनांचे काही लिखाण इंग्रजीतही आहे.

पटवर्धनांनी कवितांशिवाय भाषाशास्त्रीय लेखनही केले. सोप्या व शुद्ध मराठी लेखन पुरस्कारणाऱ्या पटवर्धनांनी भाषाशुद्धि-विवेक हा ग्रंथ लिहिला. ह्या ग्रंथात कालबाह्य ठरलेल्या शेकडो मराठी शब्दांची सूची समाविष्ट आहे. शिक्षणानंतर इ. स. 1918 ते इ. स. 1924 या कालखंडात ते फर्ग्युसन महाविद्यालय, पुणे येथे फारसी भाषा शिकवत होते. त्यानंतर ते कोल्हापूर येथील राजाराम महाविद्यालयात फारसीचे प्राध्यापक म्हणून रुजू झाले. तेथे त्यांनी इ. स. 1925 ते इ. स. 1939 या काळात अध्यापन केले. माधव त्र्यंबक पटवर्धनांना त्यांच्या ’छंदोरचना’ या ग्रंथासाठी मुंबई विद्यापीठाने 1डिसेंबर 1938 रोजी डी. लिट्. ही सन्माननीय पदवी दिली. मुंबई विद्यापीठाने मराठी साहित्यासाठी दिलेली ही पहिली डी. लिट. होती.

29 नोव्हेंबर 1939 साली ह्यांचे  निधन झाले तरीही साहित्य रूपाने ते अजूनही आपल्यात आहेतच. प्रेमस्वरूप आई वात्सल्यसिंधू आई, बोलावू तुज  आता मी कोणत्या उपायी, ह्या कवितेने तर त्यांना अजरामर केले. त्यांना स्मृती दिनी विनम्र अभिवादन.

©  सौ.कल्याणी केळकर बापट

9604947256

बडनेरा, अमरावती

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “पाणीपुरी…” ☆ श्री कौस्तुभ परांजपे ☆

श्री कौस्तुभ परांजपे

? विविधा ?

☆ “पाणीपुरी…” ☆ श्री कौस्तुभ परांजपे ☆

अरे किती मोठ्ठा घास घेतला आहेस. चावता तरी येतय का? तोंड बघ…… फुगलय नुसत. येवढा मोठ्ठा घास घेतात का? अस दरडावून, रागाने, किंवा प्रेमाने विचारणाऱ्यांच तोंड पाणीपुरी खाताना याच पद्धतीने भरलेल असत. पाणीपुरी खाण्याची दुसरी पद्धतच नाही.

इतर पदार्थांचा घास किती मोठा असावा हे आपण ठरवू शकतो. पण छोटा छोटा घास घेऊन पाणीपुरी खाताच येत नाही. पाणीपुरीचा घास हा फक्त आणि फक्त त्या पुरीच्या आकारावरच ठरत असतो. या पुरीच्या आकारात स्माॅल, मिडीयम, लार्ज असा प्रकार माझ्या पाहण्यात नाही.

वेगवेगळ्या चवीच चवदार पाणी एकत्र  त्या पुरीत भरून जेव्हा ती तोंडात भरतो किंवा सरकवतो तेव्हा त्यातलं पाणी तोंडावाटे बाहेर पडणार नाही ना याचीच कसरत करावी लागते.

ही कसरत करुन ती पूरी तोंडात सरकवल्यावर जर आतल तिखट पाणी पटकन घशात उतरल तर मात्र काही क्षण जिवाचं पाणी पाणी होतच आणि नकळत डोळ्यांच्या कडांना देखील पाणी जमा झाल्यासारखं वाटत. कधी कधी तर नाकावाटे सुध्दा……

जळजळ हा शब्द आपण कधी कधी वापरतो. पण तो समजवून सांगायचा असेल तर….. पाणीपुरी तोंडात सरकवल्यावर ती खातांना नकळत आणि पटकन जे तिखट पाणी घशातून छातीपर्यंत गेल्यावर जी जाणीव होते ती जळजळ. आणि ही तात्पुरती असली तरी पाणीपुरी खाताना व्यवस्थित जाणवते.

या पुरीला नाजूकपणे व हळूवार हाताळाव लागत. नाहीतर आपला जबडा उघडण्या अगोदरच ती तिचा जबडा उघडते आणि त्यातल्या पाण्याने बोटं चिकट होतात. त्यामुळे तिने तिचा जबडा उघडण्याअगोदर आपला जबडा उघडा करून ती त्यात ढकलण्याची काळजी घ्यावी लागते.

पाणीपुरी मधल पाणी कमी वाटत कि काय, त्यात अजून उकडून बारीक केलेला बटाटा आणि उकडून किंवा भिजवून ठेवलेले हरभरे घालून परीक्षा थोडी कठीण करतात.

पाणीपुरी ही तोंडात भरावी, सरकवावी, किंवा ढकलावीच लागते. या पध्दतीने खाल्ली तरच तिला न्याय दिल्यासारख होत. नाहीतर तिच्यावर झालेला अन्याय ती पाणी अंगावर किंवा प्लेटमध्ये काढून व्यक्त करते.

ही तोंडात भरण्याची सुध्दा एक खास पध्दत आहे. दोन बोट आणि अंगठा यात तिला धरून तोंडाचा जबडा उघडा करून तोंडाजवळ आणली की लगेच वेळ न घालवता तर्जनीने तोंडात सरकवतात.

यावेळी मला सहज शेव, चकली, कुरडइ यांच ओल पिठ, किंवा चिक त्या मोकळ्या साच्यात भरतात त्याची आठवण होते.

पाणीपुरी खायला वेळेच बंधन नाही. सकाळ, दुपार, संध्याकाळ, रात्र. जेवणाअगोदर किंवा नंतर अशी कोणतीही वेळ त्यासाठी योग्य असते. पण ठिकाण मात्र बऱ्याचदा बाग, मैदान, तलाव याच्या जवळ आणि जवळजवळ रस्त्यावरच असत. बंद वातावरणात मजा नाही. आता घरातल्या सगळ्यांना घरातच करतो तेव्हा पर्याय नाही. पण शक्यतो उघड्यावर खाण्यातच मजा येते.

पाणीपुरी साधारण एकाचवेळी बऱ्याच जणांना एक एक करून दिली जाते. त्यामुळे पहिली तोंडात सरकवल्यावर दुसरीचा नंबर लागेपर्यंत पहिली संपवावीच लागते.

पाणीपुरी हा काही जणांचा विकपाॅइंट असतो. तर विकली कुठल्या कुठल्या पाॅइंटवर पाणीपुरी खायची हे काही जणांच ठरलेल असत. तरीसुद्धा गावात पाणीपुरी कुठे चांगली मिळते याची माहिती घेण्याचा प्रयत्न असतोच. आणि तिथे भेट देणं गरजेचं वाटतं.

बरेच पदार्थ हे हातगाडीवर उभ्या उभ्या खाल्ले जात असले तरी एक दोन बाक त्या गाडीजवळ बसण्यासाठी असतात. पण पाणीपुरीच्या गाडी जवळ असे बाक क्वचित दिसतात. त्यामुळे स्टॅंडींग ओवेशन देउन खायचा मान पाणीपुरीला आहे.

©  श्री कौस्तुभ परांजपे

मो 9579032601

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ ही तर निसर्ग पूजा ☆ सौ. शुभदा भास्कर कुलकर्णी (विभावरी) ☆

सौ. शुभदा भास्कर कुलकर्णी (विभावरी)

?  विविधा ?

☆ ☘️ ही तर निसर्ग पूजा 🌿 ☆ सौ. शुभदा भास्कर कुलकर्णी (विभावरी) 

विविध रंगांच्या आतषबाजीने, रंगलेली, प्रकाशलेली दीपावली हा प्रकाशाचा सण संपत आलेला. आता त्याची गडबड संपलेली. तिखट गोड पदार्थांची सुस्ती जाणवते. आज दुपारीच मी तुळशी वृंदावन साफसूफ करून थोडं पाणी घातलं आणि वृंदावनही रंगून ठेवलं.तसं तर वसुबारसे पासून त्रिपुरी पौर्णिमेपर्यंत दिवाळी असते.या दीपोत्सवाची तेव्हाच सांगता होते . कार्तिक शुद्ध एकादशी पासून तुलसी विवाह सुरू होतात ते पौर्णिमेपर्यंत. त्यानंतर लग्नाचे मुहूर्त असतात .आधी देवाचं लग्न त्यासाठी तर वृंदावन छान रंगवलं.ऊसाचे खांब करुन,मांडव सजवायचा आणि छान आरास करायची .तोरण बांधायचं. देव्हाऱ्यातला बाळकृष्ण वृंदावनात तुळशीजवळ ठेवायचा. तुळशीची , बाळ कृष्णाची पूजा करायची पण त्याआधी सुपारीच्या गणपतीच प्रथम पूजन!

तुळशीला, बाळ कृष्णाला नवीन वस्त्र वस्त्र घालायची तुळशीच्या हातात म्हणजे फांद्यांना हिरव्यागार बांगड्या घालायच्या. मंगलाष्टक म्हणून अक्षदा वहायच्या की झालं तुळशीचं लग्न. मग फटाके उडवायचे वाजंत्री म्हणून. मणी मंगळसूत्र तुळशीला वहायच.म्हणजे फांदीवर अडकवायचे.फणी करंडा, आरसा ,खण पुढे  ठेवायचा.तुळशीची ओटी भरायची.आरती करायची.मनोभावे नमस्कार करायचा.असा हा विवाह सोहळा म्हणजे आनंदोत्सवच! जणू घरच्या लेकीचा विवाहसोहळा.

आमच्या लहानपणी तुळशीचं लग्न लावायला भटजी यायचे. दादा म्हणजे माझे वडील रेशमी  कद नेसून तर आई रेशमी जरीची साडी दागिने घालून नटायची .जणू त्यांच्याच लेकीचं लग्न आणि करवली म्हणजे मी नटून थटून तबकात तेवत्या निरांजनांचा. करादिवा घेऊन वृंदावनाच्या मागे उभी राहायची. भटजी अंतर पाठ धरायचे अन मंगलाष्टक म्हणायचे .आईची नैवेद्याची धांदल ,भावंड नव्या कपड्यात ,झाडं-चक्र,अशा आतषबाजीच्या तयारीत असायची.

शेजारचे सगळे  यायचे ते व-हाडी म्हणूनच. धुमधडाक्यात, फटाक्यांच्या आवाजात तुलसी विवाह व्हायचा. बायकांना हळदी कुंकू द्यायचे .सर्वांना साखर खोबऱ्याचा, पेढ्याचा प्रसाद वाटायचा. पान सुपारी द्यायची. ते दिवस वेगळेच होते.

लग्नानंतर आम्ही दारातल्या तुळशीचं लग्न कधी चुकवलं नाही ,घरच्या घरी लग्न लावायचो.आमची लेक करवली व्हायची .हा दिवस साधून सगळ्यांना फराळाचं आमंत्रण करायचो.

आता काळ काम वेगाच्या चक्रात सगळ्यांना हे एवढं जमतच असं नाही हे मात्र खर आहे.

आपले सगळे सण उत्सव धार्मिक असले तरी शास्त्रीय तत्वावर आधारलेले असतात .ओटी भरायची तुळशीची तीही चिंचा, आवळे ,बोरं अशा मोसमी फळांनी. आता तुळशीच पहा, पानं ,  खोड ,मंजि-या या सगळ्यांचे आयुर्वेदात औषधी गुणधर्म आहेत.या  विवाह सोहळ्यामुळे आपण तुळशीजवळ किती वेळ बसतो मनांपासून सगळी पूजा करतो . ही मनाची प्रसन्नता  आपल्या आरोग्याला पोषकच आहे.

विवाह सोहळा संपन्न झाला आणि नातवंडांनी फटाक्यांची माळ लावली.

खरंच दिव्यांच्या रोषणाईत उसाच्या मांडवात विवाह वेदीवरील अंगभर मंजिऱ्यांनी डवरलेली तुळस कशी साजरी दिसत होती. अगदी नव्या नवरी सारखी..! हळदी कुंकू आणि नंतर प्रसाद वाटप झालं.बाळकृष्ण- तुळशीला नमस्कार करताना नकळत डोळे ओलावले. आज केवळ वेळ नसला तरी कुंडीतल्या तुळशीजवळ देव्हाऱ्यातला बाळकृष्ण ठेवून नुसतं हळदीकुंकू वहावं.अक्षता टाकाव्यात. सौभाग्याचं म्हणजे केवळ सुवासिनीचंच असं नाही संपन्नतेच भाग्याचं दान मागाव. श्रद्धेन एवढं जरी केलं तरी ही हरिप्रिया नक्कीच प्रसन्न होईल आरोग्याचं वरदानही देईल.

©  शुभदा भास्कर कुलकर्णी (विभावरी)

कोथरूड-पुणे.३८.

   मो.९५९५५५७९०८ 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ राॅबर्ट फ्राॅस्ट यांच्या कवितेचे शताब्दी वर्ष -२०२२ ☆ श्री सुबोध अनंत जोशी ☆

श्री सुबोध अनंत जोशी

परिचय:

शिक्षण – एम्.ए., एम्.फील.

निवृत्त उपप्राचार्य, निवृत्त असोसिएट प्रोफेसर,इंग्रजी विभाग ,मथुबाई गरवारे कन्या महाविद्यालय, सांगली.

एम्.फील साठी यु.जी.सी. ची संशोधन  शिष्यवृत्ती.

संशोधक  व विद्यार्थी उपयुक्त  पुस्तके:

  1. A comparative study of Robert ब्राउनिंग and Diwakar
  2. Literary perceptions

संपादन:

  1. गोपुर दिवाळी अंक 1980
  2. झेप- गौरवग्रंथ 2003
  3. संवेदना – अनाथ मुलांमुलींवरील
  4. कथासंग्रह  1984

लेखमालिका :

  1. भारतीय स्वातंत्र्य वीरांनी तुरुंगातून  लिहीलेली पत्रे
  2. प्रेरणादायी पुस्तके

वृत्तपत्रे, मासिके यांतून नियमित लेखन-कथा, कविता, पुस्तक परिचय  इत्यादी.

विद्यापीठ अनुदान मंडळ संमत दोन संशोधन प्रकल्प पूर्ण.

विविध संशोधन नियतकालिकांतून संशोधन निबंध प्रकाशित.

?  विविधा ?

☆ राॅबर्ट फ्राॅस्ट यांच्या कवितेचे शताब्दी वर्ष -२०२२ ☆ श्री सुबोध अनंत जोशी ☆

Stopping by Woods on a Snowy Evening. (1922.)

राॅबर्ट फ्राॅस्ट यांच्या कवितेचे शताब्दी वर्ष -२०२२.-त्या निमित्त:

रॉबर्ट फ्रॉस्ट(१८७४-१९६३) हा अमेरिकन कवी,परंतु त्यांच्या कविता प्रथम इंग्लंडमध्ये प्रकाशित झाल्या.  निसर्ग वर्णन,अमेरिकन बोलीभाषेचा वापर, ग्रामीण भागातील सर्वसामान्य लोकांचे चित्र ही त्यांच्या काव्याची वैशिष्ट्ये आहेत. ज्यावेळी औद्योगीकरणाला सुरुवात झाली होती, त्याचवेळी रॉबर्ट फ्राॅस्ट लिहीत होते. तरी देखील औद्योगिक शहराबद्दल, आयुष्याबद्दल  त्यांनी  फारसं लिहीलं नाही. त्यांच्या बऱ्याच कविता स्मरणरंजन विषयक(sweet nostalgia)  आहेत.The Road not taken,Birches,Mending Wall, Nothing Gold can Stay, Stopping by Woods on a Snowy Evening या त्यांच्या लोकप्रिय कविता होत.New Hampshire या काव्यसंग्रहासाठी त्यांना पुलिट्झर प्राईझ मिळाले होते.

Stopping by Woods on a Snowy Evening ही चार कडव्याची चिमुकली कविता आहे.या कवितेचे अनेक अर्थ, अन्वयार्थ काव्य समीक्षकांनी सांगितले आहेत आणि ते साहजिक आहे .कारण एखाद्या सर्वोत्कृष्ट ठरलेल्या कवितेची चिकित्सा अनेक जण अनेक प्रकाराने करतात. खरे तर, प्रत्येकाने स्वतंत्र बुद्धीने स्वतंत्र दृष्टीने ही कविता समजून घ्यावी.

ही एक साधीसुधी भावकविता आहे.  निवेदक  आपला एक छोटा अनुभव सांगतो आहे. तो घोडागाडीतून जंगलातून जात आहे आणि त्याला पहिला प्रश्न पडतो” हे कोणाच्या मालकीचे जंगल आहे ? ” त्या जंगलाचा मालक निवेदकाच्या परिचयाचा असावा.म्हणून तो सांगतो की त्या मालकाचे घर गावात आहे आणि  तो इथे थांबला आहे हे त्या मालकाला माहीत होणार नाही. पुढच्या ओळीत निवेदक सांगतो की ते जंगल बर्फाने भरून जात आहे  आणि ते बर्फाळलेले जंगल पाहण्यासाठीच कवीला तेथे थांबावे असे वाटत आहे.इथे सृष्टिसौंदर्य एवढे मंत्रमुग्ध करणारे आहे की थोडा वेळ तरी तेथे थांबून ते सौंदर्य न्याहाळावेसे कवीला वाटते.

दुसऱ्या कडव्यात आपण थांबल्याबद्दल आपल्या घोड्याला काय वाटलं असेल याची तो कल्पना करतो.(निवेदक घोडागाडीतून प्रवास करत आहे.) कोणतेही शेतघर जवळ नाही. असं असलं तरी गोठून गेलेलं तळं आणि जंगल यामध्ये आपण त्या अंधारलेल्या संध्याकाळी थांबलोय हे त्या घोड्याला चमत्कारीक वाटत असणार  अशी तो कल्पना करतो.खरे तर हे सर्व कवीच्या मनातलेच विचार आहेत.घोड्याच्या माध्यमातून तो आपल्या भावना वाचकांपर्यंत पोचवितो.

तिसऱ्या कडव्यात निवेदक सांगतो  की घोडा मान हलवतो आणि तिथे लावलेल्या घंटीची किणकिण होते.निवेदकाची कल्पना अशी की मान हलवून घोडा विचारतो आहे की तिथे अवेळी, संध्याकाळी जंगलाजवळच्या वाटेवर थांबणं चुकीचं तर नाही ना?  या ध्वनीव्यतिरिक्त दुसरा ध्वनी तेथे उमटत असतो तो म्हणजे वाऱ्याच्या झोताचा आणि बर्फवृष्टीचा. कवीची अशी ही दोन मने आहेत. एक मन त्याला तिथे थांबायला सांगते, तिथल्या सृष्टी सौंदर्याचा आस्वाद घ्यायला सांगते आणि दुसरे मन हे घोड्याच्या मनात काय चालले आहे अशी कल्पना करून त्याचे मन त्याला तिथे न थांबण्याचा सल्ला देत असते. त्याच्या मनाची स्थिती काहीशी अशी द्विधा झालेली आहे.परतु अशी दोलायमान अवस्था फार वेळ राहणे शक्य नसते. नंतरच्या, चौथ्या आणि शेवटच्या कडव्यात कवी ठामपणे सांगतो की जंगल सुंदर, घनदाट,अंधारं आहे, परंतु  मला मी दिलेल्या वचनांची पूर्तता  करायची आहे.झोपण्यापूर्वी कितीतरी अंतर मला  पार करायचे आहे.

The woods are lovely,dark and deep

But I have promises to keep

And miles to go before I sleep

And miles to go before I sleep.

तिथे न थांबता पुढे जाण्याचा आणि  आपल्या इप्सितस्थळी जाण्याचा निर्धार कवीने व्यक्त केला आहे आणि तोच त्याचा अंतिम निर्णय आहे असे  त्यानं केलेल्या पुनरूक्तीवरून स्पष्ट होते.

But I have promises to keep ही ओळ समुद्रात अचानक एखादी मोठी लाट उचंबळून यावी तशी येते आणि या ओळीपासून मूड बदलतो. आता ही निसर्गकविता रहात नाही. ही एकच ओळ अशी आहे की त्यात शंभर टक्के भौतिक, व्यवहारिक गरजेची निकड स्पष्ट केली आहे.बाकीचे शब्द आणि शब्दप्रयोग प्रतिमांच्या रूपात वापरलेले आहेत.Promises to keep हा खूप अर्थघन शब्दप्रयोग आहे.व्यवहारी जगात माणूस वचनबद्ध  असतो. कुटुंब,समाज,देश अशा अनेक घटकांशी आपली बांधिलकी असते.कौटुंबिक, सामाजिक,कायदेशीर, नैतिक अशा कित्येक नियमांचे पालन आपल्याला करावे लागते.ही वचनबद्धता आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग असते.त्यासाठी खूप कांहीं करावे लागते.खूप संघर्ष करावा लागतो.विसावा घ्यायचा तो नंतरच.किंबहुना,आपला मृत्यू ही झोप असे मानले तर मृत्यूपूर्वी आपली कर्तव्ये पूर्ण करणे क्रमप्राप्त आहे.”कर्मण्येवाधिकारस्ते” हाच तो संदेश आहे आणि या संदेशामुळेच या चार ओळी  जगप्रसिद्ध झाल्या आहेत . यशस्वी आयुष्याचे सूत्र या ओळीमध्ये आहे. कवितेचा हा ध्वन्यार्थ  आपल्या मनावर गारुड करतो. वाच्यार्थ एवढाच होता की सुंदर जंगल पहात थांबावं वाटतं पण तसं केलं तर झोपण्यापूर्वी आपल्याला आपल्या मुक्कामापर्यंत पोहोचता येणार नाही.वाच्यार्थापेक्षा ध्वन्यार्थातला  उदात्त संदेश आपल्या मनाला खूप भावतो.

या संदेशामुळेच ही कविता कित्येक वर्षे शालेय विद्यार्थ्यांपासून जगप्रसिद्ध व्यक्तीपर्यंत सर्व थरातील वाचकांना आवडत आली आहे. निसर्ग कविता म्हणून  या कवितेकडे पाहता येते.निसर्गातील सौंदर्य woods, snow अशा प्रतीकातून, तर भयाची जाणीव dark, deep अशा प्रतीकात्मक शब्दातून कवी व्यक्त करतो.निसर्गातले सौंदर्य आणि त्याला जोडून येणारी किंचित् भयाची जाणीव यामधून अचानक उसळी घेते स्वकर्तव्याची जाणीव.यामुळेच And miles to go before I sleep या ओळीबरोबर  ही कविता फक्त निसर्ग कविता रहात नाही.  प्रौढ वाचक  या कवितेतील  संदेश आयुष्यात उतरवण्याचा प्रयत्न करतात. कर्तव्यपूर्ती हे लक्ष्य असणाऱ्या पंडित जवाहरलाल नेहरू यांसारख्या  भारतीय नेत्याला हा संदेश मृत्यूपूर्वी आपल्या टेबलावरील कागदावर लिहून ठेवावा असे वाटणे साहजिकच आहे.

एक रचना (structure) म्हणून देखील या कवितेचा अभ्यास करता येईल. Mcleish या समीक्षकाने कवितेने कांहीही सांगू  नये, ती एक रचना असावी,असे म्हटले आहे.(A poem should not mean but be) एक रचना म्हणून या कवितेचा असल्यास केला तर असे दिसेल की या कवितेत रुबायतचा Stanza form आणि डॅन्टे या इटालियन कवीच्या कवितेतील terza Rima वापरून नाविन्यपूर्ण काव्यरचना केली आहे.

कवितेत निवेदक स्वतःशीच बोलतो आहे म्हणजे एक प्रकारे हे स्वगतच आहे आणि ते स्वगत कुजबूज या स्वरूपातले. त्यामुळेच त्याचे शब्द संभाषणात्मक आहेत. सॅम्युअल कोलरीजने कवितेची व्याख्या A lyrical, linguistic shorthand अशी केली आहे.ही कविता तशीच आहे.भावमधुर आणि अल्पाक्षरी.काहींच्या मते ही संपूर्ण कविता म्हणजे जीवनमृत्यूचे  रूपक आहे . बर्फाने भरलेले जंगल म्हणजेच मृत्यू आणि घोडा गाडी म्हणजे आयुष्य अशी कल्पना केली आहे.कवितेतील प्रेरणादायी संदेश मनाला सर्वात जास्त भावतो. यामुळेच काव्य म्हणजे जीवनाचे भाष्य(Poetry is the criticism of life) ही मॅथ्यू अर्नोल्ड यांनी केलेली काव्याची व्याख्या  या कवितेला चपखलपणे लागू पडते.

१९२२ या वर्षी राॅबर्ट फ्राॅस्ट यांनी लिहिलेल्या, Stopping by Woods on a Snowy Evening या कवितेला  २०२२ साली  शंभर वर्षे पूर्ण झाली आहेत.एवढे मार्गक्रमण करूनही ही चिमुकली कविता काव्यरसिकांच्या मनात घर करून राहिली आहे.जीवनाचे सूत्र सांगणा-या अशा कविता स्थलकालातीत असतात हे खरे!

ले. सुबोध अनंत जोशी

सांगली

मो 9423661068.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
image_print