मराठी साहित्य – विविधा ☆ बुरी नजरवाले तेरा मुॅंह काला ☆ श्री अरविंद लिमये

श्री अरविंद लिमये

?विविधा ?

☆ बुरी नजरवाले तेरा मुह काला ☆ श्री अरविंद लिमये ☆

मुल़-मुली बाहेरुन खेळून तिन्हीसांजेला घरी परत आली की त्यांची किंवा घरातल्या तान्ह्या बाळांचीही पूर्वी मीठ-मोहऱ्या ओवाळून ‘दृष्ट’ काढली जायची. परगावाहून घरी आलेल्या मुली-सुनांना उंबऱ्यातच थांबवून त्यांच्या पायांवर पाणी घालून,त्यांच्यावरुन भाकरतुकडा ओवाळून टाकला जायचा आणि मगच त्यांना घरात घेतलं जायचं. बाहेरची इडापिडा बाहेरच रहावी,ती त्यांच्यासोबत आंत येऊ नये,त्यांचा त्यांना त्रास होऊ नये ही भावना असलेल्या आणि रुढींनी शिक्कामोर्तब केलेल्या या परंपरा..! जुनं ते सगळं निरर्थक, त्याज्य, अवैज्ञानिक,तथ्यहीन म्हणून हे बऱ्याच प्रमाणात आता कालबाह्य झालेलं आहे.तरीही बराच काळ उलटून गेल्यावर मानसशास्त्राच्या अभ्यासांतर्गत झालेल्या विविध संशोधनातून Negative आणि Positive waves चे आपल्या आरोग्यावर,स्वास्थ्यावर होणारे परिणाम ठळकपणे अधोरेखित होऊन स्विकारले गेल्यानंतर मात्र आपल्या भारतीय संस्कृतीतल्या वर उल्लेख केलेल्या आणि आज निरर्थक वाटणाऱ्या प्रथा-परंपरांमागचं विज्ञान नव्याने जाणवतं आणि त्या त्या प्रथा तथ्यहीन नसल्याचं आपल्या लक्षात येतं.

या ‘दृष्ट’ काढण्याच्या संकल्पनेतील ‘दृष्ट’ या शब्दाचा ‘दृष्टी’ याअर्थी थेट संबंध ‘वाईट नजरे’शीच आहे.वाईट नजरेतली  पूर्वी गृहित धरली गेलेली इडा-पिडा म्हणजेच आजच्या विज्ञानाचं समर्थन मिळालेल्या ‘Negative-waves’च. ‘बुरी नजरवाले तेरा मुॅंह काला’ या उक्तीमधे वाईट नजरेचा तिरस्कार ओतप्रोत भरलेला आहे तो यासाठीच.मग या Negative waves घराबाहेर काढून टाकण्यासाठी मीठ-मोहऱ्याच का? यामागेही कांही शास्त्र (म्हणजेच विज्ञान) असणारच. आज अशा कोडी बनून राहिलेल्या आपल्या संस्कृतीतील अनेक परंपरांमागचं विज्ञान जाणून घेण्याचं औत्सुक्यच त्या कोड्या़मधे लपलेलं रहस्य शोधायला आपल्याला उद्युक्त करणारं ठरेल.

इतर चार ज्ञानेंद्रियांच्या तुलनेत आपल्या पंचज्ञानेंद्रियांमधील ‘डोळे’ या ज्ञानेन्द्रियाची खास वैशिष्ट्ये आहेत.डोळ्यांचं वर्णन करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या विशेषणांचे असंख्य अलंकार इतर चार ज्ञानेंद्रियांच्या वाट्याला तितक्या प्रमाणात येत नाहीत म्हणून मला ‘डोळे’ वैशिष्टयपूर्ण वाटतात.बघा ना.डोळ्यांसाठी आपण त्यातील भावछटांनुसार किती विविध विशेषणे वापरतो.

डोळे टपोरे असतात.हसरे असतात. डोळे बोलके असतात. खोडकर असतात. तेजस्वी असतात किंवा विझलेले सुध्दा.ते उत्सुक असतात. निराशही कधीकधी. प्रेमळ असतात,तसेच जुलमी न् अधाशीही..!

खरंतर डोळे हे डोळेच असतात.ही जी असंख्य विशेषणं आपण डोळ्यांचे वर्णन करायला म्हणून वापरतो त्यांचे खरे हकदार डोळे नसतातच. खरी हकदार असते त्या डोळ्यांमधली नजर..! डोळे हे या नजरांचे वाहक असतात फक्त.मनातल्या या विविध भावना नि:शब्दपणे तरीही अचूक व्यक्त करत असते ती नजरच.लटका राग असो वा टोकाचा संताप.समाधान,आनंद असो किंवा दुःख, वेदना,घुसमट असो वेळोवेळी या सगळ्या भावना नजरेतून आधी डोळ्यांत उमटतात,मग चेहर्‍यावर पसरतात आणि नंतर शब्दांतून व्यक्त होतात.भावनेच्या तीव्रतेमुळे क्वचित कधी शब्द मुकेच राहिले तरीही नजरेतून व्यक्त होणाऱ्या या भावना त्यांच्या कमी-अधिक तीव्रतेनुसार पाहणाऱ्यापर्यंत           ‘शब्देविण संवाद ‘ साधत अचूक पोचतातच.

या भावना तशा हानीकारक नसतात. याला अपवाद अर्थातच अधाशी डोळ्यांचा. नजरेतल्या अधाशीपणाचा. वरवर विचार केला तर अधाशीपणातून पोटातली भूक व्यक्त होते असा समज आहे. पण मला वाटतं की भुकेलेपण आणि अधाशीपण यात जमीन-अस्मानाचा फरक आहे. कारण भुकेल्या नजरेत एक प्रकारची अगतिकता असते. व्याकुळता असते. अधाशी नजरेत याचा लवलेशही नसतो. असते फक्त अतृप्ती. अधाशी पणात काठोकाठ भरलेला असतो तो फक्त हव्यास. तिथं ‘आणखी हवं’ ला अंतच नसतो.

अधाशीपणातली भूक अन्नाचीही असते पण फक्त अन्नाचीच नसते.भूक अनेक प्रकारची असू शकते. पैशाची असते, यशाची असते, प्रतिष्ठेची असते, सौंदर्याची असते किंवा वासनेने अंध झालेल्या मनातल्या उपभोगांचीही असते..!

हव्यास आणि अतृप्ती हे अशा अधाशीपणाच्या विकृतीतले समान धागे. अधाशीपण खाण्याच्या बाबतीतलं असेल तर कितीही खाल्लं, पोट भरलं तरी तृप्ती नसतेच. असते अतृप्तीच.तसंच भूक पैशाची असेल तर कितीही पैसा मिळाला तरी समाधान नसते. आपल्यापेक्षा अधिक पैसा मिळणाऱ्यांबद्दल हेवाच असतो मनात.हेच कोणत्याही प्रकारच्या भूकेबाबतचं समान वास्तवच.

अधाशीपणा लालसेने लडबडलेला असतो. तिथे अतृप्तीत भिजलेली वखवख असते फक्त ! हा हव्यास, ही  वखवख अधाशी डोळ्यांमधे ठासून भरलेली असते.ती लपूच शकत नाही. ही अधाशी डोळ्यांमधली नजरच ‘दृष्ट’ लावणारी असते. हे दृष्ट लागणं म्हणजेच इडा-पिडांच्या काळ्या सावल्या..! अधाशी डोळ्यांचं हे लागटपण म्हणजे Negative waves चे वहानच.आणि ‘दृष्ट काढणं’ हा त्यावरचा मानसिक निश्चिंतता देणारा बुऱ्या नजरेवरचा उतारा..!!

 

©️ अरविंद लिमये

सांगली (९८२३७३८२८८)

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ चं म त ग ! – दाढी !☆ श्री प्रमोद वामन वर्तक

श्री प्रमोद वामन वर्तक

? विविधा ?

? चं म त ग ! ?  श्री प्रमोद वामन वर्तक ⭐

? दाढी ! ! ?

First impression is…….

लेखाची सुरवात अशी एखाद्या अर्धवट सोडलेल्या इंग्रजी वाक्प्रचाराने केली की वाचकांवर इंप्रेशन पडतं, असं जाणकार म्हणतात ! खरं खोटं तेच जाणोत ! असो ! मी आत्तापर्यंतच्या माझ्या सगळ्या लेखांची सुरवात मराठीतूनच केलेली आहे हे आपल्याला (ते लेख वाचले असतील तर!?) आठवत असेलच आणि हा माझा पहिलाच असा लेख आहे, की ज्याची सुरवात मी इंग्रजीतून केली आहे ! आता ती इंग्रजीतून केली आहे याच महत्वाचं कारण म्हणजे आजचा विषय, जो पुरुषांच्या जास्त जवळचा म्हणजेच दाढी, शेव्ह आणि “शेवेचा” विषय बायकांचा ! तसा “शेवेचा” उपयोग पुरुषांना ती खाण्यासाठी पण होतोच, यात वाद नाही पण “शेव” या शब्दात मी श्लेष साधलाय, हे चाणक्ष वाचकांच्या लक्षात आले असेलच !  त्यामुळे आजच्या लेखाची सुरवात मी इंग्रजीतून केल्ये हे बरोबरच आहे, हे आपण दाढी खाजवत (वाढली असेल तर) जाणकारां प्रमाणे (नसलात तरी) मान्य करायला हरकत नाही ! समजा, जर अखिल भारतीय केश कर्तनालयाचा प्रवक्ता “रोज दाढी करण्याचे फायदे” या विषयावर स्वतः अर्धा अर्धा इंच दाढीचे खुंट ठेवून बोलायला उभा राहिला, तर त्याच्या बोलण्यावर पब्लिक विश्वास तरी ठेवेल का ? म्हणूनच मी सुरवातीला असा अनेक वेळा घासून गुळगुळीत झालेला इंग्रजी वाक्प्रचार ठेवून दिला ! त्यामुळे अशा इंग्रजी वाक्प्रचाराने लेखाची सुरवात करून, उगाचच मी आपल्यावर इंप्रेशन मारतोय, हा आपल्या मनांत माझ्याविषयी झालेला गैरसमज कृपया आपण काढून टाकाल अशी मला आशा आहे ! तर, पुनः एकदा असो !

मुलांना वयात आल्यावर जसे त्यांच्या अकलेला (मुळात असेल तरच) धुमारे फुटायला लागतात, तसेच त्यांच्या गालावर, ओठांवर, हनुवठीवर बारीक बारीक केसांचे धुमारे फुटायला लागतात ! या दोन्ही धुमाऱ्यात फरक असा, की अकलेचे धुमारे फुटलेत हे त्याला, “जास्त अकलेचे दिवे पाजळू नकोस!” हा डायलॉग कधीतरी वडीलधाऱ्याकडून ऐकल्यावर कळतं आणि गालावरचे किंवा ओठावरचे धुमारे तसे दृगोचर असल्यामुळे तो मुलगा वयात आलाय हे इतर लोकांना कळतं !

माझ्या पिढीत, तारुण्यात पदार्पण करायच मुलांच वय साधारण सोळा ते अठरा होते.  हल्लीच्या (कली) युगात ते आणखीन खाली आलंय असं म्हणतात ! याची कारणं काय आहेत ? यावर दाढी खाजवता खाजवता उहापोह करायचा म्हटला, तरी या विषयातील विद्वजनांचे एक चर्चासत्र नक्कीच होईल ! एवढच कशाला, या विषयावर माने पर्यंत केस असलेला आणि आपल्या पांढऱ्या काळ्या (का काळ्या पांढऱ्या ?) दाढी मिशांनी आणि त्याच रंगाच्या जाड जाड केसांच्या भुवयांनी, आपला अर्ध्याहून अधिक चेहरा झाकला गेलाय असा विद्वान, मनांत आणेल तर भला मोठा प्रबंध नक्कीच खरडेल !

मी तरुण (शरीराने?) असतांना आमच्यातला एखादा उंटावरचा शहाणा मित्र, गप्पा मारता मारता “आपण बुवा नोकरी बिकरी करणार नाही तुमच्या सारखी, एक सॉलिड धंद्याची आयडिया आहे आपल्या डोक्यात !” असं त्या गप्पांच्या ओघात आम्हाला ऐकवायचा. मग त्या वर आमच्यापैकीच कोणीतरी एक मित्र त्याला, “खिशात नाही दाढी करायला दीड रुपया आणि गोष्टी करतोय दीड लाखाच्या !” असं ऐकवून त्याची टर उडवायचा आणि आम्ही बाकीचे त्यात सामील व्हायचो ! मंडळी, तेव्हा दाढी करायला सलून मधे खरोखरचं चक्क दीड रुपया पडत होता आणि दीड लाखात एक छोटासा का होईना, पण स्वतःचा व्यवसाय सुरु करता येत होता, आहात कुठे !

आमच्या काळी कॉलेजला जाणारे सगळे तरुण, स्वतःला त्या काळातल्या  सिनेमातील अनेक “कुमारां” पैकी आपण एक आहोत, अशा चुकीच्या समजूतीतून पोरींवर इंप्रेशन मारायला, रोज गुळगुळीत दाढी करून कॉलेजला येत असत. त्या कुमारां पैकी जमतेम 2-3 टक्के कुमारांच सूत, स्वतःला कोणीतरी “कुमारी” अथवा “बाला” समजणाऱ्या बालिकांशी जमे आणि बाकीचे सगळे रोजचा दाढीचा खर्च वाचवून, त्या पैशातून “चार मिनार” नाहीतर “पनामा” पिऊन, मजनू बनून फिरत ! तसं बघायला गेलं तर, अस्ताव्यस्त वाढलेली दाढी ही तेंव्हा तशी प्रेमभंग झाल्याची एक निशाणी होतीच, पण त्याच्या जोडीला, जर त्या मजनूच्या तोंडात वरील दोन पैकी कुठली सिगरेट असेल तर, त्याच्या मजनूपणावर आम्ही तेंव्हा शिक्कामोर्तब करत असू आणि जमलं तर अशा मजनू पासून शक्यतो चार हात लांबच कसं राहता येईल याचा विचार डोक्यात चालत असे ! त्याच एक कारण म्हणजे, उगाच कोणा “कुमारी” अथवा “बालाचे” आमच्या बाबतीत चांगले असलेले इंप्रेशन, खराब व्हायला नको म्हणून !

बैरागी बुवा किंवा एकुणात बुवा मंडळींना ओळखायचा एक सोपा मार्ग म्हणजे त्यांची वाढलेली दाढी ! तसं बघायला गेलं तर तो अशा लोकांचा “ट्रेड मार्कच” म्हणायला हवा ! पण हल्लीच्या कलियुगात वावरणाऱ्या आधुनिक “महाराज” आणि “बुवा” लोकांनी या भरघोस दाढीचा त्याग केलेला आपल्याला पहिला मिळेल ! त्याची कारण काय असतील ती असोत बापडी, पण मला विचाराल तर, प्रत्येक बुवांनी किंवा महाराजांनी दाढी ठेवणं खरच त्यांच्या हिताचं आहे, असं आपलं मला त्यांच्याच हितापोटी वाटतं ! म्हणजे कसं आहे ना, एखाद्या भक्ताने अशा बुवांना किंवा महाराजांना काही अवघड प्रश्न विचारून त्यांची पंचाईत केली, तर निदान दाढीवर हात फिरवून विचारात असल्याचे तरी भासवता येईल नां ? म्हणजे होईल काय, “बुडत्याला काडीचा आधार” या जुन्या म्हणीच्या जोडीला, मी तयार केलेली “बुवाला दाढीचा आधार” या नवीन म्हणीचा उद्गगाता म्हणून माझं नांव इतिहासात दर्ज व्हायला मदत तरी होईल! या माझ्या विधानाशी तुम्ही असलेली, नसलेली स्वतःची दाढी खाजवत सहमत व्हाल, अशी मी माझी स्वतःची “बुलगानीन” दाढी खाजवत आशा करतो !

जगात चांगली आणि वाईट अशी अनेक प्रकारची व्यसनं अस्तित्वात आहेत यात दुमत असण्याचं कारण नाही. आणि प्रत्येक प्राणीमात्र स्वतःला आवडणारी आणि कधीतरी खिशाला न परवडणारी व्यसनं सुद्धा आपापल्या परीने करत असतो आणि त्यात रमत असतो ! पण काही काही लोकांना दिवसातून तीन तीन वेळा दाढी करण्याचं व्यसन असतं आणि अशी माणसं माझ्या प्रमाणे तुमच्या पण पाहण्यात नक्कीच आली असतील ! या लोकांना ओळखायची एक सोप्पी पद्धत म्हणजे, त्या लोकांच्या गालांचा रंगच सततच्या ब्लेडच्या खरवडण्याने, बदलून चक्क हिरवा काळा झालेला असतो ! आता हे लोकं आपली दाढी दिवसातून तीन तीन वेळेस करून, कुणा कुणाला ती “टोचू” नये याची इतकी काळजी का घेतात, ते त्यांचे त्यांनाच माहित ! आपण उगाच कशाला त्यांच्या भानगडीत आपली दाढी, सॉरी नाक खुपसा !

काही काही अवलिया लोकांना, इतिहासात होऊन गेलेल्या पराक्रमी विरां प्रमाणे, आपल्या दाढी मिशीचा कट ठेवायला आवडतो ! अर्थात असे फक्त “दाढी मिशी वीर” खऱ्या आयुष्यात किती आणि कुठली विरता गाजवत असतील हा एक संशोधनाचा विषय होईल ! त्यांना त्यांच्या दाढी मिशीचा कट लखलाभ !

शेवटी, आपल्या सर्वांनाच, आपले स्वतःचे कुठलेही काम दुसऱ्याकडून वेळेवर करून घेण्यासाठी, (ते काम करणारा पुरुष असेल आणि त्याला दाढी असेल तर) त्याची दाढी कुरवाळायची वेळ येऊ देऊ नकोस, हिच त्या जगतनियंत्याच्या चरणी माझी प्रार्थना !

शुभं भवतु ! ?

© श्री प्रमोद वामन वर्तक

(सिंगापूर) +6594708959

मो – 9892561086

ई-मेल – pradnyavartak3@gmail.com

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ आयुष्याचे धडे गिरवताना… ☆ सौ .कल्पना कुंभार

सौ .कल्पना कुंभार

? विविधा  ?

☆ आयुष्याचे धडे गिरवताना…☆ सौ .कल्पना कुंभार ☆

आयुष्याचे धडे गिरवताना…

खरं आयुष्य उमगत गेलं…

    –  सौ.कल्पना कुंभार..

आपल्या आयुष्यात असे काही क्षण येतात ज्यामुळे कळत नकळत आपली जीवनाकडे पहाण्याची दृष्टीच बदलून जाते..काही व्यक्ती ,काही प्रसंग ,काही चित्रपट, नाटकं तर काही पुस्तक आपल्याला आयुष्य कसं जगावं ..? याचा धडाच देतात व जगणंच बदलून टाकतात..

एकदा  लहानपणी दुसरी तिसरीला असताना मी माझ्या कुटुंबियांसोबत आमच्या गावी गेले होते. तेथे गेल्यावर दुसऱ्याच दिवशी मम्मी पहाटे लवकर उठली व गोठ्यात गेली..मलाही जाग आली होती म्हणून मीही गेले मागून.. तिने गोठा स्वच्छ केला व म्हशीची धारही काढली.. मी सगळं पहात तेथेच बसले होते..मी मम्मीला म्हणाले, ” मम्मी, तुला घाण वाटत नाही का ग गोठ्यात..?मला तर खूप वास येतोय व शेण बघून कसतरीच होतय..आणि तुला दूध काढायला कसं येत ग..?तुला भीती नाही वाटली म्हशींची.??”

मम्मी म्हणाली, ” अग जस आपण आपलं घर स्वच्छ करतो तस हे म्हशीच घरच आहे..आणि   तुला एक सांगू ..नेहमी लक्षात ठेव ..माणसानं वाईट काम करताना लाज बाळगावी ..चांगलं काम करताना नाही..मी गोठा स्वच्छ केला कारण ते स्वच्छ राहिले तर जनावरांच आरोग्य चांगलं राहील व आपलंही…”

मी पुन्हा म्हणाले, ” मम्मी , पण तू तर खूप शिकलेस ..शिक्षिका आहेस..मग असलं का काम करायचं..?” मम्मी हसली व म्हणाली , ” बाळ,कोणतंही काम लहान मोठं नसत ग..आणि आपण खूप शिकलो तरी आपल्या काही गरजा भागविण्यासाठी काम करावेच लागते ..आणि कष्टाच काम करण्यात लाज कसली..? ज्या कामामुळे आपले ,आपल्या कुटुंबाचे व समाजाचे नुकसान होईल ते काम करायला लाजावे..”

त्यावेळची ही घटना मला खूप काही शिकवून गेली.. आणि आयुष्यभर लक्षात ही राहिली..कोणतंही काम कमी दर्जाचं नसत..त्यामागचे कष्ट व प्रामाणिक हेतू महत्वाचा..मग अस कष्टाचं काम करायला लाजायच कशाला..??आपण जीवनात कितीही शिकलो..खूप पैसा मिळवला तरी मातीशी पाय घट्ट रोवून उभं रहायचं..हे मी नकळत शिकले..

माझ्या लहानपणापासून च मला माझ्या पणजोबा व पणजी चा सहवास लाभला..त्यांना एकच लेक..ती म्हणजे पप्पांची आई.. त्यामुळे त्यांना संभाळणार कोण..?असा जेंव्हा प्रश्न निर्माण झाला तेंव्हा पप्पा त्याना इचलकरंजी ला घेऊन आले..पणजी मी लहान असतानाच गेली पण माझे पणजोबा..आम्ही बाबा म्हणायचो त्यांना..खूप प्रेमळ पण तेव्हढेच कडक स्वभावाचे..उंच,धिप्पाड शरीरयष्टी.. जणू पैलवानच..सगळेच घाबरायचे त्यांना..सगळं वेळेत लागायचं त्यांना..मम्मी शाळेच्या गडबडीतही खूप छान सांभाळायची त्यांचा स्वभाव..कधीच चिडलेल किंवा आदळआपट केलेलं पाहिलं नाही  मी तिला…

एकदा बाबा आजारी होते..उठताही येत नव्हतं..सगळ्या चादरी ही घाण झाल्या होत्या.. त्यांनाच सांगताना लाज वाटत होती . पण माझ्या पप्पानी व मम्मीने कसलीही तक्रार न करता..ते शी व शु च सगळं स्वच्छ तर केलंच..मम्मी ने बाबा ना आंघोळही घातली..बाबांचेच डोळे पाणावलेले मी पाहिले त्यावेळी.. नंतर मी व दादाने त्या दोघांना विचारले, ” तुम्हाला शी काढताना घाण नाही वाटली..?” पप्पा म्हणाले, ” त्यांनी मी लहान असताना माझी पण शी काढलीच होती..त्यांना कधी घाण वाटलं नाही..मग मला कसं वाटेल..आणि माणूस जसजसा म्हातारा होतो ना..तसा तो लहान मुलांप्रमाणे वागायला लागतो..मग आपल्याला मोठं व्हाव लागतं.. कोणीही समोर असू दे..त्याच्या वेळेला पडताना नेहमी मन स्वच्छ ठेवायचं..कशाला घाण नाही म्हणायचं..हेच जगणं आहे बाळांनो…” आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी ..पप्पा व मम्मी दोघेही शाळेला गेल्यावर..पप्पांच्या प्रमाणेच माझ्या दादालाही बाबांची शी काढताना पाहिलं..आणि हा प्रसंग मनावर कोरला गेला..दोन वर्षांपूर्वी जेंव्हा माझे सासरे आजारी पडले तेंव्हा मलाही त्यांचं सगळं करताना अजिबात घाण वाटलं नाही..आणि माझ्या बाबांच्या डोळ्यात जस पाणी होतं तसच पाणी मला माझ्या  आहोंच्या डोळ्यांत त्यावेळी दिसलं… माझ्या मुलांसाठीही कदाचित आयुष्यातील तो एक धडाच होता…

या lockdown मध्ये जेंव्हा मी आजारी पडले तेंव्हा माझ्या दहावी मध्ये असलेल्या लेकाने कपडे मशीन मध्ये धुऊन उन्हात वाळत घालण्यापासून ते मला ताट वाढून हातात देण्यापर्यंत न लाजता काम केले . मला भावनिक आधारही दिला..तेंव्हा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संस्कार कसे पाझरत जातात  हे समजलं..या कोरोनाच्या काळातही आजी आजोबांचं ऑक्सिजन रोज जेंव्हा माझी लेक चेक करायची तेंव्हा त्यांच्या डोळ्यांतील अभिमान माझ्याही डोळ्यांत उतरत होता..

आज आयुष्याचा धडा गिरवताना या विषयाबद्दल विचार करताना मला आणखी एक प्रसंग तुम्हा सर्वांना सांगू वाटतो..

मी बीए करत होते..त्या रात्री पप्पाना एकदम अस्वस्थ वाटू लागलं..श्वास घेताना त्रास होऊ लागला..तेंव्हा दादाने त्याना life line ला ऍडमिट केलं..त्यांना हार्ट अटॅक आला होता..कसलंस इंजेक्शन ही दिलं डॉक्टरनी.. दादा त्यावेळी MD करत होता. पप्पाना ICU मध्ये ऍडमिट करून दोनच दिवस झाले होते आणि…मम्मीची आई..माझी आजी हार्ट ऍटॅक ने गेली.. गावाकडून फोन आला रात्री..मला तर काहीच समजेना..काय करावे..दादा दवाखान्यात थांबला होता.. त्याने गाडी ठरवली व मम्मी व तिच्या मैत्रीणीला सोबत म्हणून गावी पाठवलं.. सगळं आवरून मम्मी पहाटे परत आली..आणि माझ्या गळ्यात पडून खूप रडली….सहा वाजले होते..न झोपता आवरून नाश्ता व चहा घेऊन लगेच   सात वाजता ती दवाखान्यात पप्पांसमोर हजर होती..जणू काही झालंच नाही..हसत सगळं  करत होती..स्वतः च दुःख बाजूला सारून पप्पांच्या विनोदावर तिला हसताना बघून मला मात्र खूप रडू येत होतं..पण कसं काय मलाही माहीत नाही..मीही खंबीर होत गेले.. त्यानंतर पप्पांची बायपास सर्जरी झाली जी खूप क्रिटिकल होती..देवाची कृपाच ती सर्जरी यशस्वी झाली..पण पप्पांची तब्बेत खूपच नाजूक झाली होती.. कोणताही मानसिक ताणतणाव त्यांना द्यायचा नाही असं डॉक्टरनी सांगितलं त्यामुळे पप्पांपासून ही घटना आम्ही एक वर्षभर लपवली.. त्यासाठी किती खोटं बोलावं लागलं..हे सांगताच येणार नाही मला.. घराच गेट वाजलं की बाहेर पळत जायचं..येणाऱ्या व्यक्तीला आजींचा विषय काढू नका असं तिथेच सांगून घरात घायच असं मी जवळजवळ वर्षभर केलं..या घटनेने मला शिकवलं ..आपलं दुःख कितीही मोठं असलं तरी एखादयाच्या जिवापेक्षा मोठं काहीच नाही…..

खरच असे कितीतरी प्रसंग , व्यक्ती किंवा क्षण आपल्या आयुष्यात हे येतच असतात..पण त्यातून नेमकं काय वेचायच हे ज्याचं त्यानं ठरवायचं..पण हेही तितकंच खरं त्या घटना चांगल्या असो किंवा वाईट ..शिकवून जातात बरच काही..आणि आयुष्याच्या पुस्तकातील एक धडा बनून नेंहमीच मार्गदर्शन करत रहातात …आपलं कुटुंब हे एका स्वच्छ, नितळ, गोड पाण्याच्या झऱ्यासारखं आहे..झरा जसा पुढे पुढे जाताना ही आपली खरी चव सोडत नाही..तसच आपलं आयुष्य ही असच  वाहत असत..त्यामध्ये कुठेही वाईट विचार मिसळले जाणार नाहीत यासाठी पालकांनी सजग ..जागरूक रहाणं महत्वाचं..कुटुंबात रुजलेले संस्कार हे समाजासाठी नक्कीच उपयोगी पडतात..कळत नकळत आपण इतरांना जपू लागतो.. त्यांना मदत करू लागतो..पण हे तेंव्हाच होतं जेंव्हा एखादं कुटुंब संस्काराच्या भरभक्कम पायावर उभं असत..

कविवर्य मंगेश पाडगावकर यांनी म्हटलच आहे….

सांगा कसं जगायचं..??

 कण्हत कण्हत की गाणं म्हणत

तुम्हीच ठरवा…

 

दुवा देत हसायचं की शिव्या देत रडायचं

तुम्हीच ठरवा..कसं जगायचं..??

 

पेला अर्धा भरला आहे असं देखील म्हणता येत..

पेला अर्धा सरला आहे असं देखील म्हणता येत

मग भरला आहे म्हणायचं

की सरला आहे म्हणायचं..

तुम्हीच ठरवा..

सांगा कसं जगायचं..??

 

© सौ .कल्पना कुंभार

इचलकरंजी

मोबाईल नंबर:: 9822038378

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ कृष्णा-(दहीकाल्याच्या निमित्ताने….) ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

☆ विविधा ☆ ☆ कृष्णा-(दहीकाल्याच्या निमित्ताने…) ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

कृष्णा, बंदिवासातून स्वातंत्र्याकडे तुझी वाटचाल काल रात्रीपासून सुरू झाली! कंसाच्या बंदिवासात देवकीच्या पोटी जन्माला येताच, दुसऱ्या क्षणी तुला तिथून स्थलांतर करावे लागले! विष्णू अवतारातील एक म्हणून पृथ्वीवर जन्माला आल्या बरोबरच तुला इथले मानवी जीवनाचे वनवास भोगावे लागले आणि गोकुळात जाऊन तू साधा गोपाल म्हणून जगलास ! इतर गोकुळवासी मित्रांबरोबर तुझे खेळ रंगले पण ते करता करताच तू किती राक्षसांचे पारिपत्य केलेस आणि दुष्टांच्या निर्दालनासाठी असलेला तुझा मानवी अवतार कार्यरत झाला ! गरीब बिचाऱ्या गोपांना घरचे दूध,दही, लोणी मिळत नाही म्हणून गोपींची मडकी फोडली. सर्वांसोबत त्यांच्या दही काल्यात रंंगून गेलास आणि समाजवादाचा एक धडा शिकवलास! जे आहे ते सर्वांनी वाटून घ्यायचं !थोडा मोठा झाल्यावर  सांदिपनी ऋषींच्या आश्रमात शिकण्यासाठी गेलास! तेथे गरीब सुदाम्याशी मैत्रीचे बंध ठेवून पुढील काळात त्याचा उद्धार केलास! किशोरावस्था संपून मोठा झालास आणि कंसाचा वध करून मथुऱेचे राज्य मिळवलेस !

 तारुण्यसुलभ भावनेने स्वयंवरासाठी गेलास ,तुला द्रौपदीची आस होती पण पुढे काय घडणार याचे दृश्यरूप बहुदा तुला दिसले असावे!त्यामुळे पांडवांच्या पदरी द्रौपदी देऊन तू तिचा सखा बनलास !दुर्गा भागवत म्हणतात की मित्र या नात्याला ‘सखा ‘हे रूप देऊन स्त्री-पुरुषातील  हे नाते तू अधिक उदात्त केलेस ! आयुष्यभर पांडवांची साथ देत कौरव-पांडव युद्धात तू अर्जुनाचा सारथी बनून कुरुक्षेत्रावर उतरलास योद्धा म्हणून नाही तर   सारथी बनून !एक सहज विचार मनात आला, द्रौपदीने कर्णाला ‘ सूतपुत्र ‘म्हणून नाकारले!सारथ्य करणारा माणूस समाजात खालच्या स्तरावर  असतो हे तिने दाखवून दिले पण शेवटी युद्धात तू सारथी बनून जी  पांडवांना मदत केलीस त्यातून तू सारथी हा सुद्धा किती महत्वाचा असतो हे  द्रौपदीला दाखवून  दिलंस का? तुझं सगळं अस्तित्वच  देवरूप  आणि  मानव  रूप यांच्या सीमेवर होतं!  जन्म घेतलास त्यात तू त्याच रंगाचा रंगून गेलास! मगध देशाच्या लढायांना कंटाळून तू गोकुळ मथुरा सोडून  द्वारकेला पळून गेलास आणि स्वतंत्र राज्य स्थापन केलंस म्हणून तुला रणछोडदास नाव मिळालं! वेगवेगळ्या राज्यातील राजकन्याशी विवाह करून

तू साऱ्या भरत खंडाला एकत्र आणण्याचा प्रयत्न केलास! आणि अवतार कार्य समाप्त करताना एका भिल्लाच्या हातून तुझ्या तळपायाला बाण लागून तुझे जीवन कार्य संपवलेस! कृष्णा, तुझे नाव घेतले की आपोआपच गुणा दोषातून मुक्ती मिळते असं वाटतं !कारण आपण काहीही घडलं तरी ‘कृष्णार्पण’ असा शब्द वापरून ते संपवतो .सगळं हलाहल जणू संपून जातं तुझ्या

स्मरणात! तुझा जन्म काळ मध्यरात्री येतो ,तेव्हाही आम्ही वाजत गाजत तुझा जन्मोत्सव साजरा करतो कारण अंधाराची रात्र संपून तुझ्या जन्माने उत्साहाचा आणि कर्तुत्वाचा जन्म होणार असतो .आजचा गोपाळ काला म्हणजे उत्साही कामाची सुरुवात !पावसाच्या सरी बरोबरच  पुढील वर्ष आनंदात जाऊदे हीच इच्छा! आधुनिकतेच्या नावाखाली कृष्ण – ना किंवा परमेश्वराचे अस्तित्व न माणणारे आता ‘करोना’ पुढे शरणागत झाले आहे आणि आणि त्यावरून विज्ञानाने कितीही मात केली तरी  एक हातचा तुझ्याकडे , परमात्म्याकडे आहे हे मात्र मान्य केले पाहिजे !

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ घरात मोठं कुणीतरी पाहिजे हो…! – साभार व्हाट्सएप्प ☆ संग्राहक : सौ. स्मिता पंडित

? विविधा ?

☆ घरात मोठं कुणीतरी पाहिजे हो…! – साभार व्हाट्सएप्प ☆ संग्राहक : सौ. स्मिता पंडित ☆

उद्या ह्याच पायरीवर तुम्ही असणार आहात…!

पूर्वी घरांत उंबरठे आणि मोठी माणसं असायची. त्यामुळे घराचा कारभार मर्यादेत आणि धाकात चालायचा…!

कुठल्याही कार्याचा श्रीगणेशा करण्याआधी घरातील जेष्ठ मंडळीचा सल्ला घेतला जायचा, त्यांच्या अनुभवाचे सर्व विचार करायचे, त्यामुळे घरातील देवघरा नंतर महत्वाचे स्थान म्हणजे घरातील वयस्करांचे होते…!

आताची वास्तविकता पार वेगळी आहे. काळानुसार घरात गुळगुळीत फरश्या बसल्या आणि घरातील सदस्य घराच्या मर्यादा आपआपल्या सोयीने ठरवू लागले.  स्वयंपाकघर  काय अन्  देवघर काय.. सगळीकडे घरभर चपला घालून फिरायला सुरुवात झाली…!

मोठी माणसं नाहीशी होत आहेत त्यामुळे धाक नावाची गोष्ट सुद्धा लोप पावत चालली आहे. मर्यादा, धाक , शिस्त , संस्कृती इत्यादि प्रकारच्या या गोष्टी हल्ली व्हॉट्स ऍप वर सकाळी सकाळी वाचण्यापुरत्या राहिल्या आहेत…!

पूर्वी ह्याच गोष्टी, चालीरीती घरातील मोठी माणसे सांगायची. म्हणून घरात मोठी वयस्कर माणसे पाहिजेत. संध्याकाळी दिवे लावणीला शुभंकरोति – रामरक्षा- आरतीचे स्वर कानावर पडायलाच पाहीजेत. रात्री घरी उशिरा आल्यानंतर काळजीपोटी प्रश्नोउत्तरे झालीच पाहिजेत…!

रात्रीचं उरलेलं अन्न टाकून देण्याऐवजी त्याला फोडणी -तडका देऊन आणखी चविष्ट व चटपटीत बनवून सकाळच्या न्याहरीत वाढणारं कुणीतरी पाहिजे…

मोजून-मापून खर्च कसा करायचा याचे धडे शिकवणारं… चुकलं तिथे रागवायला व कधीतरी तोंड भरून कौतुक करायला…!

घरात कुणीतरी मोठं पाहिजे हो…!

एकाच छताखाली सर्वांना एकत्र पद्धतीत बांधून ठेवणारं, टिव्ही बंद ठेवून सर्वांनी सोबत जेवण कां करावं यामागचं कारण उत्तमरित्या पटवून देणारं, घराबाहेर पडतांना देवापुढचा अंगारा कपाळावर लावणारं, आनंदाच्या वेळी पटकन देवापुढे साखर ठेवणारं, तर संकटाच्या वेळी आपल्यासाठी देवाला पाण्यात ठेवून माळ जपत प्रार्थना करणारं…

खरंच घरात कुणीतरी मोठ पाहिजेच…!

पिकलेले पांढरे केस असू देत की अंधुक झालेली नजर.. आशीर्वाद देताना थरथरणारे हाथ असू देत की सुरकुत्या पडलेलं शरीर..  लिंबू-मिरचीला मानणारे विचार असू देत की कावळ्याच्या शापाला घाबरणारे मन..  एक गोष्ट चार-चार वेळा सांगणारं बडबडं मुख असू दे की कमी ऐकू येणारे कान.. कसं कां असेना पण सांगसवर करणारं …

घरात कुणीतरी मोठं पाहिजेच…!

ज्या झाडाला फळं-फुलं येत नाही त्या झाड़ाला आपण बिनकामी झाड म्हणतो. परंतु ते झाड़ फळ-फुलं जरी देत नसलं तरी निदान सावली तरी देतं.. त्या सावलीसारखीच घरातील मोठी-वयस्कर माणसं असतात…!

त्यांच्या असण्यानेच आपल्याला नकळत खूप आधार होतो. त्यांचे अस्तित्व आपल्यासाठी खुप मोलाचे असते. घरातून बाहेर पडतांना डोकं ठेवून नमस्कार करण्यासाठी घरात ते अनुभवी पाय पाहिजेतंच…!

घरात मोठं कुणीतरी पाहिजेच हो….!

 

✍ साभार – व्हाट्सएप्प  

संग्राहक : सौ. स्मिता पंडित

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ गोकूळ अष्टमी निमित्त – कृष्णा …… ☆ संग्राहक : सौ. राधिका भांडारकर

सौ. राधिका भांडारकर

? विविधा ?

☆ गोकूळ अष्टमी निमित्त – कृष्णा …… ☆ संग्राहक : सौ. राधिका भांडारकर ☆ 

जन्माष्टमीच्या निमित्ताने वाचलेली, कै. दुर्गा भागवतांनी लिहिलेली ही सर्वोत्तम पोस्ट:

?

कृष्णा,

तुला कसलं संबोधन लावायचं? तू आकाशासारखा वाटतोस मला, आकाश कसं सतत माथ्यावर असतं आपण जिथे जाऊ तिथे सोबत करतं पण त्याचा निळा रंग बोटावर नाही घेता येत…

खरं म्हणजे तुझं नाव घेतल्यावर तू मानवी रूपात डोळ्यासमोर येतच नाहीस.. आधी येते ती आकाशाची गडद निळाई आणि मग त्यामागोमाग लहरत येतं एक मोरपीस… तुझं मोरपीस!

तुझ्याइतका मानवी जीवनात मिसळलेला कुठलाच देव नाही बघ! प्रत्येक नातं तू समरसून जगलास आणि वेळ येताच ते नातं त्यागून मोकळाही झालास! कधी परत वळून बघितलंस का रे मागे? तुझ्यामागे त्या माणसांचं काय झालं असेल तुझ्याशिवाय ?

तुझं सगळंच अतर्क्य! तू प्रचलित नियम मोडलेस. जन्म घेतलास वसुदेव देवकीच्या मथुरेत पण वाढलास नंद यशोदेकडे गोकुळात! दहीदुधाच्या चो-या केल्यास, भलत्या वयात गोपिकांची छेड काढलीस. सुदामा, अर्जुन, उद्धव यांचा मित्र तू होतासच पण द्रौपदीचा सुद्धा ‘सखा’ झालास. हे सुंदर नातं तू भारतीय स्त्रीला दिलंस. ‘बाईचा मित्र’ ही संकल्पनाच नव्हती तुझ्याआधी आपल्याकडे, ‘तो’ स्त्रीचा पिता, पती किंवा पुत्र असावा अशी आपली समाज रीत! विवाहित राधेचा प्रियकर झालास. अगदी प्रेमाचं प्रतिक म्हणून नाव घेताना राधेचं नाव तुझ्याआधी येतं.

पुढे अष्टनायिकांचा पती झालास तरी जरासंधाच्या तावडीतून सोडवलेल्या सोळा सहस्र स्त्रीयांना अभय दिलंस. तुझ्यानंतरही अनेक वर्षांनी सूरदासांनी तुझं बालपण त्यांच्या पदांतून मांडलं, मीरेने तुला ‘नटनागर गिरिधारी’ म्हणत साद घातली.

एक सांग, तू अनेक नाती निभावलीस पण जीव जडवलास तो फक्त राधेवर…! खरं ना? गोकूळ सोडल्यावर परत तू बासरी वाजवल्याचे उल्लेख कुठेच आढळत नाहीत.

गीतेत ‘यदा यदा हि धर्मस्य’ म्हणत तू परत येण्याचं वचन दिलं आहेस. पण आता युद्धासाठी नको रे येऊस, आम्ही माणसं म्हणजे एक एक बेट झालोय, यावर नात्यांचे पूल बांधायला ये!

आणि हो, येताना रुक्मिणीला नाही आणलंस तरी चालेल पण राधिकेला सोबत घेऊन ये, म्हणजे तुझी बासरी ऐकायला मिळेल.

कृष्णा, पुन्हा एकदा बासरीत सूर भरायला ये!

—–दुर्गा भागवत.

संग्राहक : सौ. राधिका भांडारकर

पुणे

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ दुर्दम्य ! ☆ श्री सुहास सोहोनी

श्री सुहास सोहोनी

? विविधा ?

☆ दुर्दम्य ! ☆ श्री सुहास सोहोनी ☆ 

हो!! ब्यायशी वर्षं पूर्ण झाली अलिकडेच! दोन-चार दिवसांपूर्वीच. मुलांनी अगदी झोकात वाढदिवस साजरा केला! या वयापर्यंत पौर्णिमेचा चंद्र हजार वेळा येऊन गेलेला असतो आयुष्यात, असं म्हणतात. मी काही एवढं गणित मांडून बसत नाही. खूप नातेवाईक, मित्र सुद्धा आले होते शुभेच्छा द्यायला. खरंच कौतुक वाटतं सगळ्यांचं.

खरं म्हंजे आता डोळे दमलेत.  नजर अर्धीमुर्धी शिल्लक आहे. भुरकट, मळकट दिसतं सगळं. डोळ्यांना पाणी येत रहातं सारखं सारखं. पण अंदाजपंचे माणूस ओळखतो!

आं? काय? काय म्हटलंत? काऽऽऽन होय!! आता काय सांगणार कानांचं?? एव्हांना  तुम्हालाही कळलंच असेल. आता काप गेले आणि भोकं ऱ्हायली! तुम्ही बंड्या म्हणायचं आणि आम्ही खंड्या ऐकायचं!! इतकंच! हा हा हा!

दांत कधीच गळून पडलेत. बोळकं झालाय् तोंडाचं. पण हिरड्या इतक्या टणक, की काहीही चावून खातो! अगदी  पोळी-भाकरी सुद्धा. दाणे खावेसे वाटले, तर कुटून खातो. पण कुटाला दाण्याची चव नाही. कोवळ्या बारिक चिंचा सुद्धा खातो. दांत नसल्यामुळे ते आंबायचा तर प्रश्नच नाही. काय ते? कवळ्या नां? केल्यात ना. पण मला त्या कवळ्यांचं तंत्र कधी जमलंच नाही. पुढे देखिल जमेल असं वाटतं नाही. बोलतांना तोंडाच्या बाहेर पटकन उडी मारेल की काय, अशी भीती वाटते! आणखी म्हणजे कवळीच्या आतमधे कण अडकतात अन्नाचे आणि हिरड्यांना टोचतात!! मग जेवतांना कवळी तोंडाबाहेर काढायची,  मिचमिच्या डोळ्यांनी बघत  फडक्याला पुसायची आणि पुन्हा तोंडांत कोंबायची – म्हणजे इतरांना घाण वाटते!! आणि आपल्याला स्वतःला सुद्धा. घाण पण आणि लाज पण! असो.

कवळी म्हटल्यावर एक गंमतीची मजा आठवली. आम्ही तिसरी-चौथीत असतांना आम्हाला वाठारे या नांवाचे एक वयस्कर पण हिंस्त्र मास्तर शिकवायला होते. यम परवडला! एकदा ते बोटीने मुंबईला चालले होते. त्यांना बोट लागली. बोटीच्या काठावरून समुद्रात उलटी  करतांना त्यांची कवळी सुद्धा समुद्रात पडली! फजितीच की! नंतर मास्तरांच्या तोंडाच्या चिपळ्या झाल्या. आम्हाला खूप मजा वाटायची. पण हसायची भीती! आता आज तो सण साजरा करतो!

हा हा हा!!

हात-पाय ना? ते तर कायमचेच संपावर गेलेत! भारी दुखतात!! कोणाला सांगणार तेल लावून चोळायला? हल्ली लोकांना नसतो वेळ! मग आपलं आपणच लावायचं! पायांना जरा बरं वाटतं आणि हातांना चांगला व्यायाम होतो! बोटं दुखतात बऱ्याच वेळा हातांची. पण आपल्या हाताचा पंजा कॉटवर पालथा टाकून त्याच्यावर आपलंच बूड टेकून पाच-दहा मिनिटं बसलं ना की बरं वाटतं, असा मला शोध लागलाय्!

स्मरणशक्ती तशी ठीक आहे. जुनं जुनं अजून सगळं आठवतं. पण नवीन विसरायला होतं. समोरच्याचा चेहरा काहीसा लक्षात असतो, पण त्याचं नांव जाम आठवत नाही! एखादं पुस्तक आणायला कपाटाच्या खोलीत जातो, पण खोलीत गेल्यावर आपण इथे कशाला आलो होतो, हे जंग जंग पछाडूनही डोक्यात येत नाही! अशा वेळी पूर्वी मी स्वतःवरच चिडायचो. पण आता माझं मलाच हसायला येतं!

पण हे तर आता असंच चालायचं. यंत्राचे भाग झिजायचेच. निकामी व्हायचेच. असो. पण काही वेळा माझं मलाच आश्चर्य वाटतं. नीट, निरोगी जगायला आवश्यक असलेल्या गोष्टी नसून सुद्धा, मी ब्यायशीची वेस ओलांडली. यानं मी तर अचंबितच होतो!

एक गोष्ट मात्र खरी. आज मितीपर्यंत आजारपण असं कधी आलंच नाही. हा नशिबाचा भाग. कधी तरी सटीसामाशी सर्दी होते. पण मी बिंधास गोळी घेतो. गोळी घेतली तरी सर्दी जायला दोन-तीन दिवस जातातच, हे गृहितच धरायचं.

मन आणि बुद्धी अजून शाबूत असावी असं वाटतंय्! काय सांगावं? स्वतःला स्वतःचाच भास नसेल ना होत? कधी कधी मनांत विचार येतो –

शंभरी गाठेन कां?

काही माहीत नाही!

कोणालाच माहीत नसतं!!

शंभरी गाठण्याची दुर्दम्य इच्छा वगैरे काहीही नाही. आज्ञा आली की आनंदानं प्रस्थान ठेवायचं!

गाडी जोपर्यंत स्वतःहून चालत आहे तोपर्यंत चालावी.

ढकलायची वेळ येऊ नये. तशी वेळ येणार असली तर तिन स्वतःहूनच स्तब्ध व्हावं, अशी मात्र

दुर्दम्य इच्छा आहे!

ॐ शांती.

? ? ?

 

©  श्री सुहास सोहोनी

रत्नागिरी

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ पाळीव प्राणी ☆ श्री प्रसन्न पेठे

? विविधा ?

☆ पाळीव प्राणी ☆ श्री प्रसन्न पेठे ☆

माणूस खूप हुश्शार, बुद्धिमान, सामर्थ्यवान वगैरे असल्यामुळे तो आपल्या बुद्धीच्या ताकदीवर अनेक पक्ष्याप्राण्यांना आपल्या घरी “पाळतो”!!  ब-याचदा तो “सिंगल” प्राणी पाळतो, क्वचित पक्ष्यांच्या “नर-मादी” अश्या जोड्याही पाळतो किंवा बैल, घोडे, गाढवं अश्या “मालवाहू” केसेसमधे दोन “नरां”नाही पाळतो…

अश्या “कुत्रा, मांजर, साप, सरडा, अस्वल, ससा, कासव, घोडा, गाढव, हत्ती, वाघ, सिंह, पोपट, काकाकुवा, मोर, मासे” वगैरे पाळलेल्या प्राण्यांनी मग त्यांचं मूळ निसर्गदत्त हॕबिटॕट आणि त्यांचे मूळ जेनेटिक आईबाप, आज्जीआजोबा, काकाकाकू, मामामामी वगैरे  सोडून आपल्या ह्या नवीन मानवी आई-बाप, आज्जीआजोबा, काकाकाकू, मामामामी वगैरेंना आपल्या मूळ चतुष्पाद किंवा मूळ पंखवाल्या नातेवाईकांसारखंच “आपलं” मानून मग ह्यांच्या नवीन घरी अॕडजस्ट होत जगायचं असतं… आणि जमेल तसं ‘मनोरंजन’ही करायचं असतं!!…

त्यातही गाय, बैल, घोडा, गाढव, हत्ती वगैरेंना या नवीन आईबाबांच्या थेट घराच्या आत हाॕलमधे, किचनमधे, बेडरुममधे केवळ आकारमानामुळे  प्रवेश नसतो (त्यांचं बोनसाय करता आलं असतं तर तोही मिळाला असता! ?) मात्र कुत्रा, मांजर, ससे, गिनीपिग्ज, बॕजर्स, सरडे, साप, माकडं, पक्षी वगैरेंना घरात कुठेही मुक्त प्रवेश असतो… त्यांना घरातल्या इतर माणसांसारखं “बोलता” येत नसलं तरी माणसांचं बोलणं शिकायलाच लागतं… त्यातही जनरली ‘घराबाहेर बांधलेल्या’ प्राण्यांशी मेजाॕरिटीली त्या त्या मानवी आईबापाच्या मातृभाषेत बोललं जातं.. पण घरात कुठ्ठेही बागडू शकणा-या कुत्रा, मांजर, माकड, ससा, कासव, सरडे, बॕजर, पक्षी वगैरे घरातल्या मेंबर्सशी (मुलगा, मुलगीच असतात हां का ते!) शक्यतो “इंग्लीश”मधे बोललं जातं! ?  कमाल आहे नाही?  ..म्हणजे आपण मानव आपल्या जन्मदात्या आईबाबांची भाषा सोडून जगातल्या इतर माणसांच्या दोनतीन इतर भाषा लिहिता-बोलता येण्यासाठी धडपडून, त्या बोलता यायला लागल्या तर कोण उड्या मारतो, काॕलर टाईट करुन घेतो!! …पण मानवापेक्षा कमी बुद्धी असणारे हे पाळीव प्राणी मात्र त्यांच्या जेनेटिक आईबाबापास्नं तोडले जाऊन जगाच्या पाठीवर, जबरदस्तीनं जगात कुठलीही भाषा बोलणा-या मानवी घरात गेले तर त्यांना लगेच त्या त्या मानवी आईबाबांची भाषा “समजायला” लागते (हे ते ते आईबाप छातीठोकपणे  सांगतातच!!) म्हणजे मग मानव जास्त हुषार की हे सारे पाळीव प्राणी? ? ? ?

अश्या त्या जेनेटिक आईबाबापास्नं दूर मानवी आईबाप स्विकारावा लागलेल्या ह्या सा-या प्राण्यांना, मग त्या नवीन मानवी घरातल्यांचंच नव्हे, तर घरात येणा-या पाहुण्यांचंही मनोरंजन करावं लागतं… आलेला पाहुणा कितीही अनोळखी असला तरी घरातल्या मानवी आईबाबांनी सांगितल्यावर त्या पाहुण्याच्या जवळ जाऊन बसावं लागतं… लगट करावी लागते… डोक्यावर थोपटून घ्यावं लागतं.. मानेखाली कुरवाळून घ्यावं लागतं… (हे सगळं त्या त्या आईबापाची ही अमानवी मुलं निमूट करत असली, तरी त्या आईबाबांची सख्खी मानवी मुलं मात्रं कधीच करत नसतात ही गंमतच!! ??

एक असंही मनात आलं मानवापेक्षा प्रगत असणा-या आणि मानवापेक्षा कॕयच्यॕकॕय वेगळा, विचित्र देह, भाषा असणा-या कुठल्या परग्रहवासीयांनी समजा म्या मानवाला (किंवा तुम्हाला कुणालाही!) असं एकेकटं उचलून त्यांच्या घरात नेऊन “पाळायला” सुरुवात केली, तर मी (आणि तुम्ही सगळेच) नक्की काय प्रकारे मनोरंजन करु त्या नवीन आईबाबांचं?  “प्रसन्न ये ..हे खा… बबन उडी मार… निशा झोप… राहुल ओरडू नको, थांब पट्टा काढते गळ्यातला, मग गपचूप पडून राहा..” वगैरे त्यांच्यात्यांच्या परग्रहावरच्या भाषेत बोलल्यावर म्या प्रसन्न कसा उड्या मारेल त्यांच्या कोचावर, मांडीवर?.. आपल्या जेनेटिक आईबाबांच्या कुशीचा स्पर्श विसरुन कसे त्या वेगळ्याच आईबाबांच्या बेडवर त्यांच्या कुशीत रात्री झोपेन मी????  ते खातात तेच अन्न “प्रसन्न eat!” म्हणून मला दिल्यावर निमूट खाईन मी? किंवा human-food म्हणून त्यांच्या इथल्या ‘पेट-शाॕप’मधून मिळणारं फूड आपल्यासमोर ओतल्यावर बिनतक्रार खाऊ आपण सारे मानव? आणि असं सर्व करत एकाकी जगू त्या जेनेटिक नसणा-या नवीन आईबाबांच्या घरी?..

हे असंच डोस्क्यात आलंय कायकाय..

 

©  श्री प्रसन्न पेठे

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ ☆ सांगू कशी तुला मी ? ☆ डॉ. शमा देशपांडे

? विविधा ?

☆ सांगू कशी तुला मी ? ☆ डॉ. शमा देशपांडे ☆

रविवारची सकाळ उगीचच सुट्टी म्हणून लोळत पडले होते. घड्याळाचा काटा आठच्या पुढे पुढे जातानाही आळस संपण्याचे चिन्ह दिसेना. घरातील मोठ्या व्यक्तींचा धाक काळाने केव्हाच ओरबाडून नेला होता. खर म्हणजे धाक कसला, धाकाच्या अंगरख्यात लपलेले प्रेमाचे छत्र हरवून गेले होते. मन झरकन चिंचोळ्या भूतकाळाच्या गुहेत उलट दिशेने धावायला लागले.

अगदी बालपणापासून, नंतर सासरी आल्यावर देखील घरात आई-बाबांचे छत्र होतेच.  सकाळी लवकर उठणे, रात्री लवकर झोपणे हा घरोघरी असणारा विधिलिखित नियम होता.सकाळी  सहा नंतर अंथरुणात लोळण्याची कधी हिंमत नसायची. अगदी लहानपणापासून  शिस्तीत जगण्याचा, एक संस्कार मनावर पक्का झाला होता. त्यावेळी त्या शिस्तीचा खरतर थोडा रागच यायचा पण लग्न होऊन सासरी आल्यावर त्या झालेल्या संस्काराची खरी किंमत कळली. टापटीप रहाणे, व्यवस्थित वस्तू आवरणे, वस्तू जागेला ठेवणे, लवकर उठणे, व्यायाम करणे,  शारीरिक व मानसिक दोन्ही आरोग्याकडे नीट लक्ष देणे. ………आता असे वाटतं आमच्या आई -बाबांनी फार धन-दौलत नाही दिली आम्हांला पण संस्कारांच्या लेण्यांनी मात्र नक्कीच आम्हांला सजवलं. हे संस्कारांचे लेणं फक्त आमच्याच कडे होते असे नाही. आमच्या त्या मध्यवर्गीय दुनियेत प्रत्येक पालक असेच घडवत असत आपल्या पाल्याला. पण त्यामुळे आमच्या पिढीला एका शिस्तीतून दुसऱ्या शिस्तीच्या घरात येताना त्याचा त्रास झाला नाही.

हळूहळू आई-मुले, वडील-मुले, सासू-सून, सासरे -सून ही सगळी नाती पूर्वीपेक्षा अधिक जवळ येऊ लागली. प्रेमामध्ये काही फरक असेल पूर्वी आणि आत्ता अस अजिबात नाही. पण त्या प्रेमळ अंगरख्याला असणारी शिस्तीची किनार मात्र हळूहळू उसवू लागली. मोकळ्या नात्यांच्या मोकळीकित शिस्तीचा धाक सैल होत गेला. पूर्वी आई-वडील म्हणायचे, सासरी गेल्यावर वळण नसेल तर जड जाईल. आत्ताच शिका सगळे.

आता आई वडील म्हणतात, “जाऊदे, लग्नानंतर जबाबदारी येणारच आहे पोरीवर, तेंव्हा राहूदे थोडे मोकळे.”

पूर्वीचे सासू-सासरे म्हणायचे, “तुम्ही  नीट तर पुढची पिढी नीट.” आणि आताचे सासू- सासरे म्हणतात, ” कशाला नवीन सुनेला धाकात ठेवायचे? लागेल वळण हळूहळू. आपण जसे थोडे का होईना दडपलेपणाने वावरायचो तसे नको मुलांना. आणि नकळत त्यामुळे पुढच्या पिढीवरील शिस्तीचा अंकुश सुटतच गेला. आता आपण म्हणजे आमची पिढी नकळतपणे  आपल्याच मुलांना, मुलींना व्यवस्थितपणा नाही, टापटीप नाही या तक्रारी करतो. म्हणजे सासुच सुनेची तक्रार करते अस नाही. आई देखील मुलीच्या या  बेशिस्त गुणांचे पोवाडे गातेच की. मग लक्षात येतं मुलांना दोष देण्यापेक्षा ती नैतिक जबाबदारी आमच्याच पिढीची तर नसेल न? आता असं वाटत, घरातील मोठ्या लोकांचा मनावर असलेला एक धाक आम्हांला खूप काही देऊनच गेला. आमच्या शिस्तबद्ध, आखीव-रेखीव जीवनाचे खरे श्रेय हे आमचे नसून ते आमच्या मागच्या पिढीचे आमच्यावर असलेले फार मोठे उपकारच आहेत. मुलांना, मुलींना, सुनांना एखादी गोष्ट सडेतोड सांगताना, मुलांना काय वाटेल, सुनेला काय वाटेल याचा विचार करण्याची कधीही त्या पिढीला गरजच पडली नाही. सगळे नियम सडेतोड!.

आत्ताची कोणत्याही घरातील आई ही आपल्या मुली, मुले, सूना यांना वळण लावत नाही, संस्कार करत नाही असे नाही. पण थोडे लाडाचे प्रमाण मात्र आमच्या पिढीचे वाढते हे नक्की. काहीवेळा कुठे सारखे संस्कार, शिस्तीच्या दावणीला मुलांना बांधायचे म्हणून सोडून द्यायचे. कधी, ‘आपल्याला झेपतेय न काम, मग सारखे मुलांना बोलून  ते काम करवून घेण्यापेक्षा झेपेल तितके काम करायचे  आणि मोकळे व्हायचे.सुनेला, मुलांना, मुलींना सारखे वळण लावत बसलो तर घरातले वातावरण बिघडेल अशी मनात भीती बाळगून गप्प रहायचे.  गप्प राहून घराचा गाडा त्या माउलीने ओढत रहायचे. घरा-घरातील हाच सोहळा थोड्याफार फरकाने, असाच साजरा होताना दिसतो सगळीकडे.

मला असं वाटत, म्हंटल तर प्रॉब्लेम,  म्हंटल तर ‘सध्या सगळीकडे असेच चालते’ म्हणून सोईस्कर सोडून देणं. पण मनात मात्र धगधग!  ‘बोलू का नको?, सांगू का नको? ‘ मुलांच्या किंवा मुलींच्या दोघांच्याही बाबतीत चुकतं तिथं वेळीच मुलांना खडसावणे ही प्रत्येक पालकाची जबाबदारी आहे. मुले (मुलगा-मुलगी) दोघेही जर व्यसने, स्वैराचार, याची एकेक पायरी चढताना दिसत असतील तर वेळीच त्यांना थोपवणे ही आमच्या पिढीचीच जबाबदारी आहे. सुरवातीला मुलांच्या किंवा मुलींच्या रात्र-रात्र बाहेर रहाण्याचे कौतुक होते कोणत्या नवीन चवीची मद्ये मुलांनी टेस्ट केली याचेही कौतुकच केले जाते. . नवी पिढी-नवा जमाना आहे म्हणून त्याकडे दुर्लक्ष केले जाते. पण नंतर स्वैराचाराच्या पायऱ्या चढत चढत  मुले जेव्हा अवनतीच्या उत्तुंग शिखरावर पोहचतात तेव्हा त्या शिखरावरून दरीत कोसळणाऱ्या मुलांना फक्त दुरून पाहून परिस्थितीला दोष, नशिबाला दोष देण्यापलीकडे काहीही आपल्या हातात उरलेलं नसते.

घरातील छोट्या छोट्या गोष्टींची शिस्त मुलांमध्ये रुजवणे जितकी महत्वाची गोष्ट तितकीच किंवा त्याहून अधिक महत्वाची गोष्ट म्हणजे आपली मुले व मुली   घराबाहेर वावरताना त्यांच्यावर एक मर्यादेचा अंकुश असणे गरजेचे आहे.  चारित्र्य, व्यसने, पार्ट्या कुठे किती थांबायचे हे मुलांना समजत नसेल तर पालकांनी हस्तक्षेप करणे खरे तर अगदी आवश्यक. पण आजकाल ‘, सांगू कशी तुला मी?’

या परकेपणातून, संकोचातुन, भीतीमधून पुढच्या पिढीचे आपण नुकसान करतो हेच मुळी आपण विसरून जातो.

मुलांच्या कोणत्याही चुकांना निर्भीडपणे विरोध करणारा समाज कुठेतरी हरवत चालला आहे. मुलांना बोललं तर राग येईल, विरोध केला तर संबंध बिघडतील या भीतीतून प्रत्येक  चुकीची गोष्ट  थंडपणे पहाणे  हे मुलांवरील प्रेम थंडावण्याचेच एक लक्षण आहे. ज्या मुलांवर तुम्ही प्रेम करता, त्या मुलांना चुकले तर रागावण्याचा तुमचा अधिकार आहेच. सुनेला जर तुम्ही तुमची मुलगी समजून मुली इतके तिच्यावर प्रेम करत असाल तर मुलीच्याच नात्याने तिला रागावण्याचा पण तुमचा अधिकार आहे. उलट मोकळेपणाने तिला चुका न सांगणे, न रागावणे म्हणजे तुमच्या नात्यात अजून परकेपणाच आहे असं समजायला हरकत नाही.

संस्कार एका पिढीतून पुढच्या पिढीत जात असतात. कळत -नकळत तुमची मुले तुमचे अनुकरण करत असतात. मग ते मोबाईल तासन तास बघणे असो, दुसऱ्याचा अनादर करणे असो किंवा बेशिस्तीचे वर्तन असो. एक म्हण आहे,   ‘पुढला बैल नेटा तर दाविल दाही वाटा’

खरं म्हणजे पुढची पिढी खूप हुशार आहे,  समंजस आहे, कित्येक बाबतीत आपल्या पेक्षा सरसच आहे. चुका होतात पण चुका स्वीकारणं व त्या सुधारणे या दोन्ही साठी हिम्मत लागते. आणि त्यापेक्षाही अधिक हिम्मत मुलांच्या चुका योग्यवेळी निदर्शनास आल्यास त्या मुलांना त्या पासून परावृत्त करण्यात असते. केवळ चांगुलपणा मिळवण्यासाठी आमच्या पिढीने म्हणजे आई, वडील, सासू, सासरे, आजी-आजोबा या सगळ्यांनीच  ‘ सांगु कशी तुला मी ? ‘ या भूमिकेचा त्याग करणे ही एका सशक्त समाजाच्या निर्मिती साठी असलेली छोटीशी  गरज आहे.

© डॉ.शमा देशपांडे

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ बिचारी आजी – भाग 3 ☆ सौ. सुनिता गद्रे

सौ. सुनिता गद्रे

☆ विविधा ☆ बिचारी आजी – भाग 3 ☆ सौ. सुनिता गद्रे☆ 

पण कधीतरी अनवधानानं ती प्रश्नांच्या कात्रीत सापडायचीच. “गणपती बाप्पाचं डोकं हत्तीचं का असतं ?” प्रश्न ऐकून गणपती जन्माची गोष्ट सांगायला तिनं सुरुवात केली…. जशी तिला माहीत होती तशी… अन् धाकटं पिल्लू रडून लागलं, “आजी हत्तीच्या बाळाचं हेड कट् केलं?… त्याला किती दुखलं असेल. ते रडलं का ? ..आजी शंकर बाप्पाने स्वतः कट् केलेलं गणपती बाप्पाचं हेडंच  पुन्हा का नाही बसवलं ? शंकर बाप्पा  हे करू शकत होता ना .तो तर   गॉड आहे…

निरुत्तर झालेल्या बिचाऱ्या आजीनं उगीच इकडचं तिकडचं सांगून वेळ मारून नेली.               

अभ्यास करताना, गोष्टी ऐकताना, खेळताना, जेवताना त्यांच्या धनुष्यातून प्रश्नांचे बाण बाहेर निघायचेच.

समोरच्या फ्लॅट मध्ये राहणारे कामत आजोबा वारले .तेव्हा कोणाही लहान मुलाला तिकडे जाऊ दिले नव्हते .पण त्या लहानग्यांमध्ये काही चर्चा झाली असेलच. “आजी मेले म्हणजे काय? “..धाकटा. “अरे ही डाईड” मोठ्याने ॲक्शन सहित करून दाखवले. मग ते असेच पडून राहणार ?..” आजीनं जरा सौम्य भाषेत समजावलं, “ते देव बाप्पा कडे गेले.”….

“देव बाप्पा इथे येऊन त्यांना घेऊन गेला का?मग मी काल हनी- बिला चप्पलनं मारलं. का म्हणजे ती आपल्याला बाईट करते ना म्हणून… ती मेली पण ती अजून डस्टबिन जवळच पडून आहे. तिल बाप्पाने का नाही नेले ?”

निरुत्तर झालेल्या बिचाऱ्या आजीनं विषय बदलला.    

प्रश्नांचा मारा झेलत झेलता दोन महिने झाले. परतीचं रिझर्वेशन झालं . पण निघायच्या आठ दिवस आधी सून सांगू लागली ,”आई ,मला पुढच्या महिन्यात यु. एस.ला जावे लागणार आहे… प्रोजेक्टसाठी… तेव्हा तुम्ही दोघं इथं याल ना.तशी मुलांसाठी मी गव्हर्नेसची व्यवस्था पण करणारच आहे. तेवढीच तुम्हाला मदत होईल.पण तुम्ही दोघं असलात म्हणजे मला कसलीच चिंता नाही .”

नाही म्हणायचा प्रश्नच नव्हता. “आजी-आजोबा तुम्ही का जाताय? परत केव्हा येणार?” सर्व जण स्टेशनवर उभे होते तेव्हा नातवंडांच्या प्रश्नाचा हल्ला त्यांच्यावर झाला. आजी म्हणाली,”तुम्ही लवकर या असं म्हणा.. प्रश्न नका बाबा विचारू” सगळ्यांनाच हसू  फुटलं .गाडी सुटली .दुसऱ्या ट्रॅक वरून एक मालगाडी वेगात क्रॉस झाली. जणू काही क, का, कि, की..ची बाराखडीच डब्यात बसून आपल्यापासून दूर गेलीय

या विचारानंआजीला हायसं वाटलं.

गाडीत बसल्या बसल्या आजी विचार करत होती, ‘मुलांमध्ये जिज्ञासू वृत्ती असणे चांगलेच आहे .त्यातून ज्ञानवर्धन होते. न घाबरता विचारणं पण उत्तमच .नुसत्या घोकंपट्टीपेक्षा असे ज्ञान मिळवणे ही एक खूप चांगली बाब आहे .पण आपणच कुठेतरी त्यांना समाधानकारक योग्य उत्तर द्यायला कमी पडतोय .

पण आजी हार मानणा-यातली नाही. तिला बिच्चारी व्हायचं नाहीय.त्यामुळे ती विचार करतेय की’ गावी पोचल्यावर चाईल्ड सायकॉलॉजीची पुस्तके वाचावित की गुगल गुरु चा सल्ला बरोबर मानावा, का सरळ एखाद्या सायकॉलॉजिस्टची अपॉइंटमेंट घेऊन दोन-चार सिटिंगमध्ये हा विषय हाताळावा…….

बघा तुम्हाला काही योग्य सल्ला सुचतोय का? सुचला तर आजीला जरूर कळवा. या फोन नंबर वर…  

समाप्त

© सौ सुनीता गद्रे

माधवनगर सांगली, मो 960 47 25 805.

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares