मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ ‘स्वयंपाक – एक साधना…’ –- लेखक: अज्ञात ☆ प्रस्तुति – सौ. शामला पालेकर ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ ‘स्वयंपाक – एक साधना…’ –– लेखक: अज्ञात ☆ प्रस्तुति – सौ. शामला पालेकर

स्त्रीचा स्वयंपाक हे केवळ रोजचे काम नाही — ती एक साधना आहे.

आणि त्या साधनेतून प्रकट होते सप्तदेवता. प्रत्येक अन्न शिजवणं, प्रत्येक फोडणी, प्रत्येक थाळी — ही एक दिव्य प्रक्रिया आहे.

आपण पाहूया, स्वयंपाक करताना कोणत्या सात देवतांचं स्त्रीजीवनात प्रकट रूप घडतं आणि त्या देवता तिच्या स्वयंपाकात कशा उतरतात.

१. श्री अन्नपूर्णा– अन्नाची देवी

‘नित्यान्नदा अन्नपूर्णा सदा पूर्णमयी मम’

गृहिणी अन्नपूर्णेचे सजीव रूप आहे. अन्नशुद्धी, सात्त्विकता, आणि प्रेम — या तीन गोष्टी ती जपते. अन्न हे शरीरासाठीच नव्हे, तर प्राणासाठी असतं — याची ती जाणीव ठेवून जेवण बनवते, त्यामुळे तिचं स्वयंपाकघर म्हणजे अन्नयज्ञाचं स्थान ठरतं.

२. श्री लक्ष्मी– समृद्धीची देवी

लक्ष्मी केवळ पैशात नाही, तर अन्नात, वेळेत, मनात आणि वर्तनात असते. जेव्हा गृहिणी वेळेवर आणि नीटनेटकं अन्न बनवते, स्वच्छता ठेवते, प्रेमपूर्वक जेवण वाढते — तेव्हा लक्ष्मी स्थिर होते.

स्वच्छ अन्नात आणि संतोषात लक्ष्मीचा वास असतो.

३. श्री सरस्वती – नादब्रह्म व ज्ञानाची देवी

स्वयंपाक करताना स्त्री किती प्रकारांनी कल्पना वापरते — कोणता मसाला, कोणती पद्धत, कोणता पदार्थ कोण पचवू शकेल, याचे विचार ती करते. तिचं हे ज्ञान, अनुभव, आणि विचारशक्ती म्हणजेच सरस्वतीचं प्रकट रूप होय.

शिवाय ती ‘मंत्र जप’ करत असते — “श्रीराम जय राम”, “दुर्गा दुर्गा”, यामुळे तिचा स्वयंपाकही मंत्रमय होतो.

४. श्री दुर्गा– रक्षण करणारी देवी

स्त्री जेव्हा स्वयंपाक करते, तेव्हा ती घराच्या आरोग्याचं संरक्षण करते. पावसाळ्यात उष्ण अन्न, उन्हाळ्यात शीत पदार्थ — ऋतूनुसार अन्न देणं ही तिची आयुर्वेदीय समज.

ती नियोजन, काळजी, आणि दक्षता वापरून अपायकारक गोष्टींपासून घराला वाचवते – ही दुर्गेचीच कृपा आहे.

५. श्री गायत्री – मंत्ररूप प्रकाशाची देवी

ती केवळ अन्न शिजवत नाही, तर भावनांचा प्रसाद बनवते. तिचा जप, तिचा सुसंस्कारित विचार – हे सगळं अन्नात उतरून येतं. यामुळे घरातले सदस्य केवळ पोटानेच नाही, तर मनानेही तृप्त होतात.

‘अन्न हे पूर्णब्रह्म आहे’, हे जिच्या कृपेतून अनुभवाला येतं, ती गायत्रीच.

६. श्री कालिका – उर्जा व निर्भयतेची देवी

स्वयंपाकघर म्हणजे तपश्चर्येचा अग्निकुंड! ती एकटीच शिजवत असते, हात पोळून घेतले तरी रडत नाही, उन्हात तळत राहते, वेळ सांभाळते, अनेक जबाबदाऱ्या सांभाळते – ही तिची कालीशक्ती आहे.

ती अशक्तपणावर विजय मिळवून उर्जेचा स्रोत होते.

७. श्री संतोषी– समाधानाची देवी

घरच्यांनी समाधानाने “छान झालंय!” असं म्हटलं, की ती तृप्त होते. ती अपेक्षा न ठेवता सर्वांना वाढते. संतोषी मातेप्रमाणे तिचं समाधान हे इतरांच्या समाधानात असतं.

गृहिणी जेव्हा समाधानात राहते, तेव्हाच तिचं घरही समाधानी होतं.

निष्कर्ष:

स्त्री जेव्हा शुद्ध मनाने, भक्तिभावाने स्वयंपाक करते, तेव्हा तिचं स्वयंपाकघर हे देवतांचे मंदिर होतं. तिचे हात म्हणजे अन्नपूर्णेचे हस्त, तिचा मनोभाव म्हणजे गायत्रीचे तेज, आणि तिचा स्वभाव म्हणजे संतोषीची कृपा.

ती जेवढं अन्न शिजवते, त्याच्या पलीकडे जाऊन ती पिढ्यांचं भाग्य शिजवत असते!

लेखक: अज्ञात

प्रस्तुती: सौ. शामला पालेकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “…तर थकवा येणारच!” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्रीमती राधा पै ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ “…तर थकवा येणारच!” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्रीमती राधा पै ☆

साधारण ४०वर्षं मागं जाऊन पाहू. स्वयंपाक घरात यंत्रं नव्हती. ताक करताना रवी वापरली जात असे, पाटा-वरवंटा रोजच्या वापरात होता, शेंगादाण्यांचा कुटासाठी खलबत्ता सर्रास वापरला जात होता. लोणची, पापड, मसाले उन्हाळ्यात घरोघरी होत असत. घरातल्या बायका या गोष्टी स्वत: लक्ष घालून करत असत. शारीरिक कष्ट होत असत, पण आहाराचा दर्जा उत्तम होता.

गरीब असो किंवा श्रीमंत, कोणत्याही घरी गेलात की तांब्या-पितळेची भांडी असायची. खाली मांडी घालून जेवायला बसत असत. दूध, ताक, लोणी, घरचं कढवलेलं शुद्ध तूप हे पदार्थ मुबलक प्रमाणात आहारात होते. स्वयंपाकाकरिता घाण्याचं तेल वापरलं जायचं. चणे, फुटाणे, शेंगदाणे असं खाणं अगदी सहज व्हायचं. प्रत्येक पदार्थाचा एक विशिष्ट सीझन होता. तेव्हाच तो पदार्थ घरी व्हायचा. पहिला पाऊस पडला की आंबा बंद. पुन्हा नाव काढायचं नाही. कैऱ्या, बोरं, आवळे, करवंदं, जांभळं, चिंचा ही फळं भरपूर खाल्ली जात होती. आताची किती मुलं ही फळं भरपूर खातात?

कपडे हातानंच घासावे लागत, धुवावे लागत. प्रत्येकजण आपापले कपडे स्वत: धूत असे. ती सवय घराघरात होती. माणसं शक्यतो पायी चालत, सायकल वापरत. शाळेचा प्रवास पायी असायचा. सकाळ-संध्याकाळ ग्लासभर दूध प्यायल्याशिवाय सुटका नसायची. कितीही कंटाळा आला तरीही, तिन्हीसांजेला रामरक्षा-भीमरूपी असायचेच.

जेवणंही रात्री आठाच्या सुमारास उरकलेली असायची. आताही जेवणं रात्री आठ वाजता होतात, पण टीव्हीवर पाताळयंत्री बायकांच्या सीरीयल्स पाहत पाहत! रात्री अंगणात किंवा गच्चीवर मुलं एकत्र झोपत असत.

या सगळ्या आयुष्यात आराम असा नव्हताच, पण आनंद मात्र भरपूर होता. एकमेकांना देण्यासाठी माणसांकडे पैसा नव्हता, पण वेळ मात्र भरपूर होता. आता आपल्याकडे वेळच नाही, स्वत:साठीही आणि इतरांसाठीही! आयुष्यं आताइतकं गतिमान नव्हतं, पुष्कळ संथ होतं. पण, त्यामुळेच थकवा नव्हता. ‘लवकर निघा, सावकाश जा, सुरक्षित पोहोचा’, हे तत्त्व माणसं दैनंदिन आयुष्यात वापरत होती. आणि त्यामुळेच, त्यांना आयुष्य जगता आलं.

राहणीमानातला साधेपणा हेही थकव्यापासून दूर असण्याचं एक प्रमुख कारण असावं. आज आपलं आयुष्य नुसतं धावपळ करण्यातच जातंय..!

लोकांच्या आयुष्यात एकटेपणा नव्हता. बहुतांश वेळ इतरांबरोबरच जायचा. प्रत्येकाच्या आजूबाजूला माणसांचा वावर असायचा. हेवेदावे, रुसवेफुगवे होते, पण त्यातही स्पष्टता होती. कारण काही लपवालपवी करण्यासारखं नव्हतंच. बंद दारं नव्हती. दारांना कुलुपं नव्हती. शेजारी एखादा पदार्थ केला तरी त्यातला वाटीभर घरी यायचाच. त्यात प्रेमही होतं आणि रीतही होती. माणसं सांभाळण्याकडे एकूणच कल होता. मानसिक अशांतता नव्हती. चिंतेचे भुंगे नव्हते. रात्री शांत झोप लागू शकत होती. भरपूर मित्रमंडळी, स्नेहीसोबती, शेजारी यांच्या सहवासात कठीण परिस्थिती पचवण्याचं बळ अंगी यायचं. धीर वाटायचा.

आज प्रायव्हसीच्या नादात हे सगळं आपण तोडून टाकलं आणि एकट्यानंच चालायचं ठरवलं. सगळ्या पातळ्यांवर आपण एकटेच लढायला लागलो, तर थकवा येणारच!

लेखक: अज्ञात

प्रस्तुती:सौ. राधा पै

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “भाषा…” – लेखिका: श्रीमती अलका सुहास जोशी ☆ प्रस्तुती – सौ. मंजुषा सुनीत मुळे  ☆

सौ. मंजुषा सुनीत मुळे

📚 वाचताना वेचलेले 📖

☆ “भाषा…” – लेखिका: श्रीमती अलका सुहास जोशी ☆ प्रस्तुती – सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆

सकाळी फराळ अगदी नेमस्त झाला. फार ऊराऊर नाही, काही नाही. शिळासप्तमी नको वाटते बाई.

कुंड्यात भाजी शिल्लक आहे थोडी. सटात चटणी आहे बघ. चमचा चमचा वाढ चारी पानात, संपून जाईल.

भगर परतून घे फोडणीत. तूप जिरं मिर्चीची फोडणी आणि दाणे घाल, जरा दुखवून. दही अधमुरं विरजलंस. पावसाळ्यात जरा सरस घालावं विरजण. दुधाला चांगला चटका द्यावा. ताक बावळट झालं की कुणी प्यायचे नाहीत. पण असूदेत. आता ते दही घुसळ नि त्याला आलं लाव, वर हातफोडणी घाल तुपाची. बेश संपेल.

ताज्या भाजणीचा चेपा लाव. हा तवा नको. उटंटवळा झालाय. दुसरा घे जाड बुडाचा. आणि नीट थाप गं. कडा कश्या खादरटल्या? न्याहार दिसायला हवीत थालीपीठं. कोथिंबीर? नको गं बाई ती जन्मसावित्री!

बरणीचा दादरा काढ. वाटीभर लोणचं पुरेल. ओळबोळ नको भरूस. कमी कर. उपासाला लिंबू पोटात गेलं की पित्त नाही उसळायचं. रीतीचं खावं तोंडीलावणं. नाहीतर आग पडेल पोटात.

तवकीलाची खीर अबोट काढून ठेव गं कुंड्यात. वहिनींचा आहे तो. रात्री येतील तेव्हा आठवणीने दे त्यांना. आणि केवढा रमथाडकाला झालाय ओट्यावर?

तू निरानिपटा कर, तोवर मी पानं घेते टेबलवर.

त. टी.

ही भाषा माझ्या आईची, आजीची, सासूबाईंची आणि त्यांच्याही सासूबाईंची. आम्ही अजूनही असं बोलतो घरात. यातला शब्दनशब्द माझ्या लेकाला, नवऱ्याला, भाचेपुतण्यांना समजतो. जे वळण आमच्या भाषेला आहे आणि घरात वावरण्याला आहे तेच पुढच्या पिढीत उतरलं आहे.

हे काही फार मोठ्या अभिमानाने किंवा गर्वाने, ताठ्याने सांगत नाहीये मी. भाषेतले कितीतरी सुंदर शब्द आम्ही सहजच टिकवतो आहोत हे लक्षात आलं म्हणून लिहिलं, इतकंच.

आणखीन एक,

घरात हाताबरोबर कामं करून टाकण्याची सवय अंगात लहानपणीच मुरली आहे, त्याच्याशी you tube चा कुठलाही संबंध तुम्हालाआढळल्यास youtube वाले आमची नक्कल करतायत असं समजायला अजिबात हरकत नाही.

लेखिका: श्रीमती अलका सुहास जोशी

प्रस्तुती : सौ. मंजुषा सुनीत मुळे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈ 

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ चालता चालता मन थबकले… लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री. मंगेश जांबोटकर ☆

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ चालता चालता मन थबकले… लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री. मंगेश जांबोटकर ☆

आज सकाळी फिरायला गेलो होतो, तेव्हा माझ्यापासून ५०० मीटर पुढे एक व्यक्ती खूप जलद गतीने चालत होती.

बहुदा रोज नेमाने चालत असणार.

निरखून पाहिल्यावर लक्षात आले, की त्या व्यक्तीची गती माझ्यापेक्षा थोडीशी कमी असावी. असे मला वाटले आणि थोडा अजून वेगाने चाललो तर नक्की त्या व्यक्तीस ओलांडून मी पुढे जाईन, ही खात्री झाली. मग काय, मी माझा वेग वाढवला आणि लक्ष एकवटून चालू लागलो. मला अजून १ मैल चालायचे होते….. मग घरी परतायचे होते

व तेवढ्या वेळात आपण त्याला नक्कीच पार करू, याची पुरेपूर खात्री मला होती…

थोड्याच वेळात लक्षात आले, की आम्हां दोघांमधील अंतर कमी झाले आहे. मी अजून वेगाने चालू लागलो. पावलागणिक अंतर कमी होत होते.

माझा मलाच अभिमान वाटू लागला होता, माझी गती पाहून… आणि तो क्षण आला, मी त्या गृहस्थाला पार केले, मागे टाकले.

हुर्र्ये..! हुर्र्ये…!! हुर्र्ये….!!!

मनातल्या मनात स्वत:चे कौतुक वाटले, जिंकलोच की आपण!

जिंकली आपण स्पर्धा!

स्पर्धा? कसली स्पर्धा? कुठली स्पर्धा? कोणाशी स्पर्धा?

याबद्दल त्या व्यक्तीला तर काहीच माहीत नव्हते. ती या स्पर्धेचा भागही नव्हती.

मात्र जिंकण्याच्या ईर्ष्येने मीच माझा नियमित रस्ता सोडून पुढे निघून गेलो होतो. जेथून वळायचे होते, ते वळण मागे पडले होते. आता उशीर होणार होता, वेळापत्रक चुकणार होते.

अचानक चिडचिड होऊ लागली,

अस्वस्थता वाढली. माघारी जाण्यामध्ये बराच वेळ जाणार होता.

असेच होते ना आयुष्यातसुद्धा?

सगळे लक्ष कोण पुढे आहे,

कोण पुढे जातो आहे,

कोण पुढे जाईल?

याकडेच असते.

सहकारी? शेजारी? मित्र? नातेवाईक? यांच्यापेक्षा आपण सरस आहोत, त्यांच्यापेक्षा आपण पुढे आहोत हे स्वत:ला आणि इतरांना दाखवून देण्यातच आयुष्य जाते.

मग आपला मार्ग चुकतो किंवा बरेच काही करायचे राहून जाते. या अनैसर्गिक तुलनेतील धोका म्हणजे

“हे न संपणारे दुष्टचक्र आहे. ”

ही नशा आहे, ही झिंग आहे,

हे ध्यानात येत नाही. कोणीतरी पुढे असणारच आहे, हेच नैसर्गिक आहे, हेही ध्यानात येत नाही.

विनाकारण असुरक्षिततेची भावना प्रबळ होते व आपण सुख गमावून बसतो.

▪️कोणाचे तरी मूल जास्त शिकलेले बनणार हे नक्की!

▪️कोणाच्या तरी मुला-मुलींची लग्ने लवकर होणारच!

▪️त्यांना सासर उत्तम मिळणारच!

▪️कोणीतरी आपल्यापेक्षा जास्त सुंदर असणारच!

▪️कोणाला तरी एखादी संधी जास्त मिळणारच!

▪️तो अगदी मोठ्या पदावर असणार. त्याचा पगार गलेलठ्ठ असणारच!

▪️कोणाचे तरी वलय आपल्यापेक्षा मोठे असणारच!

▪️कोणाला तरी आपल्यापेक्षा कमी आजार असणारच!

▪️कोणाजवळ तरी काही तरी वेगळे, अधिक असणारच!

कुणाशी तुलना करून काहीही होत नसतं. शेवटी आपली गती ती आपली गती. आहे ते कसे उपभोगता येईल, हे पाहावे. दुसऱ्याचा तिरस्कार, द्वेष, मत्सर, असूया करून, क्लेश करून घेऊन जगणे योग्य नव्हे. स्वतः शक्य आहे तेवढे चांगले करावे. जेवढी मदत करता येईल तेवढी करावी. जमत नसेल तर आपण स्वतः स्वतःसाठी जगावे आणि कायम आनंदी राहावे.

 ☆ ☆ ☆ ☆

कवी: अज्ञात

प्रस्तुती : श्री. मंगेश जांबोटकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ संवेदनशील पोलिस… – लेखक : श्री अजय पाटील ☆ प्रस्तुती – सौ. प्रज्ञा गाडेकर ☆

? वाचताना वेचलेले ?

⭐ संवेदनशील पोलिस… – लेखक : श्री अजय पाटील ☆ प्रस्तुती – सौ. प्रज्ञा गाडेकर ⭐

गोष्ट अमेरिकेतील आहे. बॉबी व्हाईट नावाच्या पोलिसाला मुलं रस्त्यावर दंगामस्ती करून गोंधळ घालत असल्याचा कॉल आला. हा पोलीस घटनास्थळी पोहोचला, तर त्याने बघितले की काही मुले रस्त्यावर बास्केटबॉल खेळत होती.

पोलीस आल्याचे बघून मुलं जरा घाबरली मात्र बॉबी व्हाईटने त्यांच्या हातातील बास्केटबॉल घेतला आणि स्वतः त्यांच्यामध्ये खेळू लागला. ते बघून त्याच्यासोबत आलेले पोलीस साथीदारसुद्धा मुलांसोबत खेळायला लागले. सुरुवातीला तिथे 4-5 मुले होती मात्र पोलिसांना खेळतांना बघून आजूबाजूच्या घरातील मुलेसुद्धा त्यांच्यात सामील झाली.

संध्याकाळी पोलीस डिपार्टमेंटच्या पी. आर. ने त्यांच्या वेबसाईटवर पोलिसांचा मुलांसोबत खेळतानाचा व्हिडिओ अपलोड केला.

आणि त्याखाली लिहिले “मुलांनी घरात बसून व्हिडिओ गेम खेळण्यापेक्षा किंवा टीव्ही बघण्यापेक्षा गल्लीत खेळलेले कधीही चांगले”.

हा व्हिडिओ तब्बल 50 लाख लोकांनी बघितला. तसेच दीड लाख लोकांनी हा व्हिडिओ शेअर केला.

या व्हिडिओची अमेरिकाभरात चर्चा झाली.

अमेरिकन मीडियानेसुद्धा हा मुद्दा उचलून धरला आणि आपल्या संध्याकाळच्या प्रोग्राममध्ये चर्चासत्रं आयोजित केली.

पुढच्या वेळेला बॉबी व्हाईट आपल्या सोबत एक सरप्राईज घेऊन गेला. मुलं खेळत असताना पोलिसांच्या कारमधून प्रसिद्ध बास्केटबॉल प्लेयर शकील ओनिल उतरला. मुलांच्या आनंदाला पारावर राहिला नाही. शकील ओनिल मुलांमध्ये बराच वेळ खेळला. त्यातील एका छोट्या मुलाला त्याने 100 डॉलरही बक्षीस दिले.

या घटनेचे पडसाद अमेरिकेत उमटले आणि अमेरिकन जनतेने पोलिसांचे आभार मानले.

बऱ्याच ठिकाणी मुले घराबाहेर पडून गल्लीत खेळायला लागली. आणि लोकांनीसुद्धा त्यांच्याबद्दल तक्रार करणे सोडून दिले.

हा आमूलाग्र बदल फक्त एका संवेदनशील पोलिसामुळे घडला.

आपल्याकडेही भारतात आता मुलांनी गल्लीत खेळणे जवळपास सोडून दिले आहे. पालकांना सुद्धा मुलांचे घरातच राहणे आवडते. अशामध्ये मुलांना स्मार्टफोन किंवा टीव्हीची सवय लागते आणि त्यांच्यातील शारीरिक ऊर्जा कामात येत नाही.

यामुळे मुलांना अनेक मानसिक शारीरिक समस्या निर्माण होतात. लोकांनासुद्धा शांततेची एवढी सवय झाली आहे की गल्लीत मुले खेळली की लगेच त्यांना त्रास होतो.

योग्य काय, अयोग्य काय हे समजून घेण्याचा कुणीही प्रयत्न करत नाही.

ज्या गल्लीमध्ये मुलं खेळतात, खरंतर त्या गल्लीमध्ये चैतन्य, आनंद नांदतात.

मुलांना स्मार्टफोनच्या विश्वातून बाहेर काढण्याचा सोपा मार्ग म्हणजे त्यांना बाहेर खेळू देणे.

अशा वेळेला सर्व पालकांनीच पुढाकार घेऊन मुलांना बाहेर खेळण्यासाठी प्रवृत्त केले, तर याहून चांगली गोष्ट कोणती असणार!

लेखक: श्री. अजय पाटील

चाइल्ड काऊन्सलर, जिंदगी फाउंडेशन.

प्रस्तुती: सौ. प्रज्ञा गाडेकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “म्हणून मी नेहमी आनंदी असतो…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. शोभा जोशी ☆

सौ. शोभा जोशी 

? वाचताना वेचलेले ?

☆ “म्हणून मी नेहमी आनंदी असतो…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. शोभा जोशी ☆

मी भूतकाळ चघळत नाही..

भविष्याचीही मी चिंता करत नाही…

त्यामुळेच मी वर्तमानात जगतो..

म्हणून मी नेहमी आनंदी असतो.

 

मी कुणाकडून काडीची अपेक्षा करत नाही..

मी कुणाबद्दल राग मनात

धरत नाही…

रागात असलो तरी मी लगेच सगळ्यांना माफ करतो…

म्हणून मी नेहमी आनंदी असतो.

 

मी कसलाच हव्यास आणि लोभ करत नाही..

कोणाच्या भरभराटीने जळत नाही..

आहे त्यातच समाधानी राहून

दुसऱ्याच्या सुखातही सुख मानतो…

म्हणून मी नेहमी आनंदी असतो.

 

मी हायफाय राहण्यासाठी धडपडत नाही..

कोणावर कधीच जळत नाही..

साधं राहून आपल्या नात्यांत सुखानं रमतो..

सगळीच नाती मी मनापासून जपतो…

म्हणून मी नेहमी आनंदी असतो.

 

कोण काय बोलतं ह्याचा मी कधीच विचार करत नाही..

कोणी काहीही बोललं तरी

पुन्हा मी ते फारसं स्मरत नाही..

माझं जीवन स्वछंदी आहे

ते मी मजेत जगतो..

म्हणून मी नेहमी आनंदी असतो.

 

मला पदाचा वा ज्ञानाचा

अहंकार आला नाही..

कधी तुच्छतेचा विचार माझ्या मनाला भावला नाही..

पाय जमिनीवर ठेवून प्रसंगी अनवाणी चालतो..

म्हणून मी नेहमी आनंदी असतो.

 

जगायला काहीच भौतिक

सुख लागत नाही..

म्हणून मी गर्वाने कधीच

वागत नाही..

सगळ्यांशी प्रेमाने आदराने

आपुलकीने वागतो..

म्हणून मी नेहमी आनंदी असतो.

 

जन्म शाश्वत आहे

तसा मृत्यू देखील शाश्वत आहे

याची मला ही जाणीव आहे..

माझ्यातही दोष आहेत

आणि काहीतरी नक्कीच उणीव आहे..

याचीच जाणीव ठेवून

 मी माझं जीवन जगतो…

म्हणून मी नेहमी आनंदी असतो.

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती: श्रीमती शोभा जोशी

मो ९४२२३१९९६२ 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ मस्त आयुष्य जगण्याचा स्वस्त फंडा… लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती : सुश्री उषा नाईक ☆

📖 वाचताना वेचलेले 📖

मस्त आयुष्य जगण्याचा स्वस्त फंडा… लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती : सुश्री उषा नाईक ☆

आयुष्यातील प्रत्येक स्टेजचा आपण आनंद घ्यायला हवा. आयुष्य तसं म्हटलं तर खूप सोपं आहे, आपणच विनाकारण किचकट करून ठेवतो.

‘लोक काय म्हणतील’, या विचाराने आपणच आपल्या मार्गात स्पीड ब्रेकर घालून घेतो.

कोणाला भेटावेसे वाटले तर भेटा, बोलावेसे वाटले तर बोला. एखाद्याविषयी काही आवडले तर स्तुती करा, नाही आवडले तर स्पष्टपणे पण न दुखावता सांगा. हेच दिसण्याच्याही बाबतीत लागू होते.

पिकले केस आवडत नाहीत, कलर करावेसे वाटतात?

– तर करा.

वाढलेली ढेरी कमी करायची आहे?

– जिम सुरू करा, नसेल जमत तर रोज किमान तासभर चाला.

नव्या पिढीसोबत स्वतःला अपग्रेड करायचंय?

– तर लोकांचा विचार न करता खुश्शाल नव्या स्टाईलचे कपडे घाला.

लहान मुलांमध्ये मूल होऊन आपले शैशव पुन्हा जगावेसे वाटतंय?

-तर जगा ना! कुणी अडवलंय?

सर्वात आधी आरशात दिसणाऱ्या स्वतःला आहे तसे स्वीकारायला शिका…

वय वाढत चाललंय, हे स्वीकारलं तरच आपण तणावमुक्त जीवनाचा आनंद मनमुराद लुटू शकतो. वाढत्या वयासोबत येणारी वेगवेगळी फेज स्वतःसोबत नवनवीन क्षण घेऊन येते. त्या त्या फेजचा मनसोक्त आनंद घेता आला पाहिजे. कुमार वयातील आठवणीत हरवून बसलात, तर प्रौढ वयात येणाऱ्या क्षणांना आणि आनंदाला मुकाल.

* कोणतही क्रिम किंवा फेसपॅक तुम्हाला गोरं करणार नाही.

* कोणताही शॅम्पू तुमची केस गळती रोखू शकणार नाही.

* कोणतेही तेल टकलावर केस उगवू शकणार नाही.

* कोणताही साबण बच्चों जैसी कोमल स्किन देणार नाही.

कोणत्याही टुथ पेस्टमध्ये नमक नसतं, व कोणत्याही साबणामध्ये निम नसतो.

सगळेच जण आपआपली दुकानं थाटून तुम्हाला मूर्ख बनवायला बसलेत. तेव्हा दिखावे पर न जाओ, अपनी अकल लगाओ.

तुम्ही विसाव्या वर्षी जसे दिसत होतात, तसेच चाळिशीत आणि साठीत दिसाल, अशी अपेक्षा ठेवणे मूर्खपणाचे आहे. कोणत्याही वयात फिट राहणे मात्र महत्त्वाचे आहे.

पोट सुटलंय तर सुटू दे, त्यासाठी लाज वाटून घेऊ नका. आपलं शरीर वयोमानानुसार बदलत राहतं. वजन पण त्याप्रमाणे कमी जास्त होत राहतं. हे सगळे नैसर्गिक आहे.

आलेली परिस्थिती सर्वप्रथम स्वीकारा आणि ती बदलण्यासाठी स्वतःला तयार करा.

जन्म, बालपण, तारुण्य, म्हातारपण आणि मृत्यू हा तर निसर्गाचा नियमच आहे. आजपर्यंत कोणीही हे टाळू शकले नाही, हे स्वतःला आधी पटवून द्या.

जुन्या मशीनचा मेन्टेनन्स करून अपटूडेट करता येते; पण नवीन नाही करता येत. आपल्या शरीराचेही तसेच आहे. ऑरगॅनिक धान्य, ऍलोविरा, कारले, मेथी, जिरे,

ओवा वगैरेचे घरगुती उपाय व्हिडीओ यु ट्यूबवर धुमाकूळ घालत आहेत. इन्टरनेट, सोशल मिडीयावर वेगवेगळ्या उपदेशांनी नुसता उच्छाद मांडलाय.

“अमुक खा, तमुक खा. हे खाऊ नका, ते खाऊ नका. गरम खा. थंड पिऊ नका. कपालभाती करा. सकाळी निंबूपाणी, दुपारी ताक आणि रात्री गाईचं दूध घ्या. दीर्घ श्वास घ्या, डाव्या कुशीवर झोपा, ऊजव्या कुशीवरून ऊठा. हिरव्या पालेभाज्या खा, डाळीत प्रोटीन असतात. ज्वारी खा, नाचणी खा, वगैरे वगैरे… “

वरील सारे उपदेश वाचले की, डोके गरगरु लागते. काय योग्य, काय अयोग्य तेच कळत नाही.

डिप्रेशनची भर पडते ती वेगळी….

अनेक देशी विदेशी कंपन्या जाहिरातींचा भडिमार करून डोक्याचा नुसता भुगा करतात. कोणते उत्पादन चांगले हेच कळत नाही.

आपण सर्वचजण कधीतरी मरणार आहोत, पण मरण्याआधी खऱ्या अर्थाने जगणंच विसरून चाललो आहोत, असं तुम्हाला नाही वाटत का? खरं सांगा..

सर्वात महत्त्वाचे म्हणजे मजेत रहा. कोणत्याही गोष्टीचा पश्चात्ताप करू नका. चुका सर्वांकडूनच होतात, तुम्ही काही देव नाही. स्वतःवर प्रेम करा. दोष देण्याचे काम करण्यासाठी आसपास भरपूर लोक आहेत. नकारात्मक लोकांकडे दुर्लक्ष करा. सकारात्मक विचारसरणीची लोकं जोडा, त्रासदायक लोकांपासून दूर राहा. आवडेल ते खा, पण प्रमाणात. थोडा का होईना, पण रोज नियमित व्यायाम करा. आनंदात रहा. शरीराला त्याचं कार्य करू द्या.

लेखक : अज्ञात

प्रस्तुती :सौ. उषा नाईक

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ ‘नाही’ चा आदर करा – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. दीप्ती गौतम ☆

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ ‘नाही’ चा आदर करा –  लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. दीप्ती गौतम

एकदा एक पक्षीण पावसाळ्यात अंडी घालण्यासाठी घर आणि निवारा शोधत होती. तिला दोन झाडं दिसली आणि ती संरक्षण मागायला गेली.

तिने पहिल्या झाडाला विचारले असता त्याने तिला आसरा देण्यास नकार दिला. निराश होऊन ती दुस-या झाडाकडे गेली. आणि दुसऱ्या झाडाने होकार दिला.

तिने घर केले आणि अंडी घातली आणि मग पावसाळा आला.

पाऊस इतका मुसळधार होता की पहिले झाड पडले आणि पुरात वाहून गेले.

पक्ष्याने हे पाहिले आणि टोमणे मारत म्हणाली:

“हे बघ, हे तुझे कर्म आहे, तू मला आश्रय दिला नाहीस, आणि आता देवाने तुला शिक्षा दिली आहे.”

झाड शेवटच्या वेळी हसले आणि म्हणाले: “मला माहीत होते, की मी या पावसाळ्यात जगणार नाही, म्हणूनच मी तुला नकार दिला, कारण मला तुझा आणि तुझ्या मुलांचा जीव धोक्यात घालायचा नव्हता. ”

पक्ष्याला अश्रू आले कारण..

ती आणि मुलं जिवंत का आहेत हे तिला आता कळलं!

शिकवण:

  1. आपण नेहमी कोणाच्या “नाही” ला त्यांचा अहंकार समजू नये..
  2. तुम्हाला संपूर्ण चित्र माहीत नसते..
  3. इतरांचा निर्णय तुमच्या बाजूने असो किंवा नसो, त्याचा आदर करा.
  4. आपण आपल्या समस्यांमध्ये इतके गुंतून जातो की आपण समोरच्या व्यक्तीचा मुद्दा बघायला विसरतो.
  5. त्यांचा हेतू समजून घेण्याचा प्रयत्न न करता, आपण आपले निर्णय घेत असतो.
  6. आम्ही इतरांना त्यांच्या ‘नाही’वर कधीही न्याय देऊ नये कारण आम्हाला त्यांची कथा माहीत नसते.
  7. त्यांच्या ‘नाही’मागे तुमच्यासाठी काय चांगले दडलेले आहे हे तुम्हाला माहीत नसते.

त्यामुळे नेहमी ‘नाही’चा आदर करा, विराम द्या आणि तुमच्या मनात त्याबद्दल वा त्यांच्याबद्दल कोणताही निर्णय घेण्यापूर्वी त्याचा खोलवर विचार करा!

कवी:अज्ञात

प्रस्तुती : सौ. दीप्ती गौतम

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ कालाय तस्मै नमः… कवयित्री : सौ. नंदिनी देव ☆ प्रस्तुती – डॉ. ज्योती गोडबोले ☆

डॉ. ज्योती गोडबोले

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ कालाय तस्मै नमः… कवयित्री : सौ. नंदिनी देव ☆ प्रस्तुती – डॉ. ज्योती गोडबोले 

☆ आई.. ☆

 *

आई विचारी लेकीला

घालू का तुझा खोपा?

देऊ का गं तुला मी

छान श्रावण झोका?

 *

छानशी नेसवू का

साडी नऊवारी?

सजतील किती छान

तुमच्या मंगळागौरी॥

 *

तुझ्या गं जीवलग

सख्यापार्वत्या बोलाव ।

सणावाराचे दिवस

आनंदात घालव॥

 *

झेल बघ अंगावर

मस्त श्रावणधारा ।

घे श्वासात भरून

ताजा मोकळा वारा॥

 *

खीर पुरणपोळी

करते तुझ्यासाठी ।

ये की माहेरपणास

लेकी माझ्यासाठी!

 *

येता माहेरवाशीण

सवाष्ण मी घालीन ।

पुरणावरणाचं ताट

तुझ्यापुढे ठेवीन॥

 *

शुक्रवारच्या छान छान

कहाण्या मी वाचीन ।

पुन्हा एकदा तुझ्यासह

लहान होऊन जाईन॥

 *

झिम्मा फुगडी खेळू

करू थोडा दंगा ।

घालेन मग मी थोडा

आठवणींचा पिंगा॥

 *

लेक… ☆

नको गं आई तू

भलतंच बाई बोलू ।

नको बरं कसलाच

उगाच घाट घालू॥

 *

नोकरी महत्त्वाची!

कुठून मिळवू रजा?

कसले सणवार अन्

कसली आलीय मजा॥

 *

नको गं तो झोका

नको घालू खोपा ।

उगीच आठवत राहतो

माहेरघरचा सोपा॥

 *

काळ बदलला तशा

आम्हीही बदललो ।

त्या जीवनशैलीला

आम्ही दुरावलो।

 *

हौस आहे आम्हाला

वेळ नाही गवसत ।

आवडत असलं तरी

नाही काहीच जमत॥

 *

मनाच्या तळकोपऱ्यात

जरी आहे सारं जपलेलं ।

तरी काळापुढे धावणारं

आहे जग बदललेलं ।

 *

त्यापेक्षा तूच किनई

जरा बदल स्वतःला ।

घराबाहेर पड अन् जा

सहलीला देशाटनाला॥

 *

मुक्त हो स्वच्छंद हो

घे आनंद जीवनाचा ।

येतो सावरता तुला तोल

नव्या आणि जुन्याचा॥

 *

अगं! नको होऊ नाराज

काढीन बरं मी वेळ ।

तुझ्यासारखाच घालीन

नव्याजुन्याचा मेळ॥

 *

आपले मोलाचे संस्कार

मी नाही बरं विसरणार ।

जमेल तसा तो वारसा

पुढे पुढे मी नेणार॥

कवयित्री:सौ. नंदिनी देव

प्रस्तुती : डॉ. ज्योती गोडबोले 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ पर्स… लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्रीमती स्वाती मंत्री ☆

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ फुगा… लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्रीमती स्वाती मंत्री ☆

तिने लग्नाला जाण्यासाठी नवा लखलखणारा चपलाहार घातला. तो हार करून घेण्यासाठी एकेक पैसा जमवला होता. पण हार घरी आल्यावर दोन दिवसांनी त्याला मॅचिंग कानातलं हवं, असं तिला वाटू लागलं. हाराचा आनंद जाऊन कानातलं कधी व कसं बनवावे याची विवंचना लागली. हा तिचा नेहमीचा अनुभव होता. हवी ती गोष्ट मिळाल्यावर तात्पुरता आनंद होतो आणि पुढचं व्यवधान लागतं. त्यानं ती दमून गेली होती. अनेक प्रकारचे दागिने, साड्या, क्रोकरी, गाडी मिळवूनही आपण आनंदी कसे नाही, हा विचार तिला सतावत होता.

काल परवा श्री नाना पाटेकर यांचं भाषण ती यु ट्युब वर बघत होती. ते म्हणाले, ” देवानं आपल्याला दोन हात दिले आहेत. दोन हाताच्या ओंजळीत जेवढं मावेल तेवढं आपल्याला पुरेसं आहे. तेवढं भरल्यानंतर ते मातीत पडण्याअगोदर लोकांना देऊन टाका. कारण ते नाहीतरी जाणारच आहे. ”

तिच्या मनात आलं की नाना शेतकऱ्यांसाठी, समाजासाठी एवढं काम करतात, कारण त्यांच्याकडे प्रसिध्दी आहे, पैसा आहे. आम्ही काही करायचं म्हटलं तर कसं शक्य आहे? पण जो संचय केला आहेस त्यातले काहीही तुला बरोबर नेता येणार नाही, असे अंतर्मनाने परत परत ऐकवले आणि ती वैतागून उठली.

मन कुठे रमत नाही म्हणून उठली आणि चालायला बाहेर गेली. रस्त्यात एक १५ वर्षाचा मुलगा हेलिअम भरून फुगे विकत होता. “ताई घ्या की फुगा. आज काही विक्री झाली नाही. लई वर जातोय बघा हा फुगा. बघा तरी! ” तो काकुळतीला येऊन म्हणाला.

तिने त्याच्याकडून सहा हेलिअमचे फुगे घेतले. तो खूष झाला. “ताई, कधीही फुगे हवे असतील. वाढदिवसाला आणि कशाला तर सांगा, ” म्हणाला.

ती घरी आली. काय करू या फुग्याचं, म्हणत तिने कामवालीच्या मुलाला एक फुगा दिला. तो आनंदाने उड्या मारू लागला. एक फुगा तिनं तिच्या मुलाला दिला. त्याने आईला मिठी मारली. कामावर गेल्यावर शेजारी बसलेल्या मुलीला एक फुगा दिला. ती प्रसन्न हसली. “कशाबद्दल? ” म्हणाली. ती म्हणाली, “असंच. ” चौथा फुगा तिनं ॲाफिसच्या दारावर अडकवला. तो चकचकीत निळा फुगा बघून आत येणारे लोक “आज वाढदिवस आहे का कुणाचा? “ म्हणत एकमेकाशी नेहमीपेक्षा जास्त बोलू लागले. पाचवा फुगा तिनं घरी येताना एका भाजीवालीला दिला. तो केशरी फुगा बघून चार जास्त लोकं तिच्याकडे भाजी घ्यायला आली. शेवटचा फुगा तिनं एका मर्सिडीजमधून उतरलेल्या सुट-बुटातील व्यक्तीला दिला. तो हसून “थॅंक्यू” म्हणाला.

ती घरी आली. साधे सहा फुगे पण कोणत्याही प्रकारच्या माणसाच्या, मुलाच्या चेहऱ्यावर पटकन हसू आणतात. म्हणून दुसरे दिवशी तिने त्याच्याकडून बारा फुगे घेतले. ते जवळच्या हॉस्पिटलमध्ये पेशंटसना पाठवले. तिथून फोन आला, ” अजून थोडे फुगे पाठवा. “

तिने रस्त्यावरच्या मुलाकडून नियमितपणे फुगे घ्यायला सुरुवात केली आणि ते फुगे ठिकठिकाणी पाठवायला सुरुवात केली. फुग्याची मागणी वाढली म्हणून तिनं अगदी जरूरीच्या व रोज लागणाऱ्या चार गोष्टी घरात ठेवून बाकी सर्व विकले. त्यातून तिच्या शहरातील सर्व हॅास्पिटल्समध्ये, अनाथाश्रमात, वृद्धाश्रमात फुगे पाठवायला सुरूवात केली.

माहीत नसलेल्या बायका मुला-माणसांकडून तिला सुंदर पत्रे, मेसेजेस येऊ लागले. काही लोकांनी आमच्याकडूनही फुगे पाठवा, म्हणून देणगी देण्यास सुरूवात केली.

फुगेवाली मॅडम आता सर्वांना माहीत झाली होती. आता तिने एक एक बोध कथा लिहून ती फुग्याबरोबर पाठवायला सुरुवात केली.

ती लोकांना खूपच आवडू लागली. शहरातील टीव्हीच्या लोकांनी आता तिची दखल घेतली. तिला मुलाखतीला बोलावले.

त्यांनी विचारले, “मॅडम ही फुग्याची कल्पना कशी आली? ”

ती म्हणाली, “ मी पहिला फुगा विकत घेतला, तेव्हा त्या मुलाने साधं चपटं पडलेलं रबरी लेटेक्स घेतलं, ज्याला आपण न फुगवलेला फुगा म्हणतो. त्यात त्याने हेलिअम गॅस भरला. तो रंगीत गुलाबी फुगा एकदम वर जाऊ लागला. तेव्हा मला वाटलं की याचं वर जाण्यामागे काहीतरी कारण आहे. नाहीतर हा एका बॉक्समध्ये नुसता पडून तर होता.

जर साध्या फुग्याच्या आत एवढं काही असेल तर माणसाच्या आतदेखील नक्कीच काहीतरी असलं पाहिजे.

आतून आलेल्या आवाजाकडे जेव्हा लक्ष दिलं, तेव्हा एकेक आयडिया आपोआप येत गेली! मी फक्त त्या आतल्या आवाजाने जे सांगितले ते केले. इतके दिवसही आतला आवाज काही सांगत होता, पण त्याला गप्प बसवून मी त्याच्याकडे दुर्लक्ष करत होते. कारण बाहेरचे रंगीबेरंगी जग मला तिकडे खेचत असे. पण एक दिवस आतल्या आवाजाचे ऐकून तरी बघू म्हणून ऐकायला सुरुवात केली त्या गुलाबी फुग्याकडे बघत!

जे जमवले होते ते आताच देऊन टाकले, कारण कधीतरी द्यावे लागणारच आहे..

मग आताच का नाही, असा विचार केला.

आणि आता जे जमवले आहे ते संपत नाही. जुने होत नाही.

हा हेलिअम फुग्यालाच नाही, तर मलाही वर वर नेतो आहे. लहान थोर मी भेटल्यावर धावत भेटायला येतात. प्रेमाने मिठी मारतात.

पत्र, मेसेजेस पाठवतात.

आशीर्वाद देतात.

म्हणून त्या आतल्या आवाजाकडे कुणीही दुर्लक्ष करू नका.

तो आवाजच तुम्हाला खरी वाट दाखवेल.

आशीर्वाद, दुवा, शुभेच्छा ही आहे माझी आताची कमाई, हा माझा नवा संचय! आणि हो. हे सगळं मी माझ्या बरोबर घेऊन जाणार आहे एक दिवस!

जाताना आपण बरोबर काही नेत नाही असं कोण म्हणतं? अहो, आपल कार्यच आपल्याला लोकांच्या, आप्तस्वकियांच्या मनात जिवंत ठेवतं. मी प्रयत्न करतोय तुम्हीसुद्धा करा. पहा. किती आत्मीय सुख मिळत ते!

लेखक: अज्ञात

प्रस्तुती: श्रीमती स्वाती मंत्री

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares