मराठी साहित्य – विविधा ☆ आनंद ☆ शालिनी जोशी ☆

शालिनी जोशी

? विविधा ?

☆ आनंद ☆ शालिनी जोशी

 बालकवी म्हणतात,

आनंदी आनंद गडे

 जिकडे तिकडे चोहीकडे

 सगळीकडे आनंदच भरलेला आहे. येथे आहे. तेथे आहे. घरात आहे. बाहेर आहे. पण तो आपल्याला बोलवायला येत नाही. तर आपण त्याला शोधावा लागतो. शोधा म्हणजे सापडेल हेच आनंदाचे तत्व. मग तो झाडा, फुलात सापडतो. कधी पशु, पक्षांत सापडतो. आकाशातही असतो. जमिनीवरही असतो. फक्त बघायचे दृष्टी हवी. ज्याला जे आवडते, मन स्थिर होते तो त्याच्यासाठी आनंदाचा ठेवाच होतो.

 एखादा चित्रकार असेल, निसर्गाचे चित्र काढण्यात जेवढा तल्लीन होतो तेवढाच मांजराबरोबर खेळणाऱ्या पिल्लाचे चित्र काढण्यात किंवा एखाद्या भिकाऱ्याचे चित्र काढण्यात होतो. समोर जे आहे ते हुबेहूब कागदावर उतरवणे म्हणजे त्याच्यासाठी प्रतिसृष्टी निर्माण करणेच असते. त्यात तो तासनतास रमतो. त्याच्यासाठी तो आनंदाचा ठेवाच असतो. दुसरा एखादा वाद्य वाजवण्यात, तर कोणी नृत्यात असाच रमून जातो. तोच त्याचा आनंद ठरतो. तर कोणी ऑफिसच्या कामात जीव लावलो. कोणी कथा लिहितो तर कोणी घर नीटनेटके ठेवतो. प्रत्येकाचा आनंद वेगवेगळ्या विषयात, वेगवेगळ्या ठिकाणी पण आनंद तोच. मिळवण्याची पद्धत वेगळी असते. पोटापाण्यासाठी काहीवेळा मिळेल ते काम करावे लागते पण तेच तत्परतेने केले तर आनंद. दिरंगाई केली, कशाला उद्या पाहू, अशी उडवा उडवी कधी समाधान देत नाही. काही लोक नोकरी सांभाळून संध्याकाळी अंध लोकांना, गरजूंना मदत करण्याचे, सेवाभावे वृद्धसेवा करण्याचे, रुग्णसेवेचे काम तसेच मंदिर सेवा मनापासून करतात. तेव्हा दोघांनाही सारखाच आनंद होतो, करणारा आणि ज्याची करतो त्याला म्हणजे आनंद द्विगुणीत होतो.

 जेथे माणूस स्वतःचे अस्तित्व विसरून रमतो. देहाचे दुःख, सुख विसरतो तोच आनंदी होऊ शकतो. आनंद म्हणजे पूर्ण समाधान, तृप्ती. तो पैशाने विकत घेता येत नाही. वाटता मात्र येतो. तेव्हा भूतकाळाचा शोक आणि भविष्याची चिंता विसरून वर्तमानाचा आनंद लूटावा. समर्थ रामदास म्हणतात,

 संत आनंदाचे स्थळ l संत सुखची केवळ l नाना संतोषाचे मूळ l ते हे संत ll

 (दा. १/५/१६)

©  शालिनी जोशी

संपर्क – फ्लेट न .3 .राधाप्रिया  टेरेसेस, समर्थपथ, प्रतिज्ञा मंगल कार्यालयाजवळ, कर्वेनगर, पुणे, 411052.

मोबाईल नं.—9850909383

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “१ मे : जागतिक कामगार दिन आणि महाराष्ट्र दिन” ☆ श्री जगदीश काबरे ☆

श्री जगदीश काबरे

☆ “१ मे : जागतिक कामगार दिन आणि महाराष्ट्र दिन☆ श्री जगदीश काबरे ☆

१ मे हा दिवस जगभरात ‘आंतरराष्ट्रीय कामगार दिन’ म्हणून साजरा केला जातो. या दिवसाची मुळे एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात अमेरिकेतील कामगार चळवळीत रुजलेली आहेत. तेव्हाच्या औद्योगिक क्रांतीच्या लाटेत कारखानदार आणि भांडवलदार वर्गाने कामगारांना अक्षरशः यंत्राप्रमाणे राबवले होते. दिवसाचे चौदा ते सोळा तास काम, अत्यल्प वेतन, असुरक्षित कामाची परिस्थिती आणि बालमजुरी हे त्या काळाचे भयाण वास्तव होते. या पार्श्वभूमीवर अमेरिकेतील ‘अमेरिकन फेडरेशन ऑफ लेबर’ने १८८४ साली एक ऐतिहासिक ठराव केला. त्यानुसार १ मे १८८६ पासून आठ तासांचा कामाचा दिवस लागू करण्याची मागणी केली गेली. या मागणीसाठी शिकागो शहरात हजारो कामगार रस्त्यावर उतरले. ४ मे १८८६ रोजी हेमार्केट चौकात एक प्रचंड मोठी सभा भरली होती. त्या वेळी अज्ञात व्यक्तीने बॉम्बस्फोट केला, पोलिसांनी गोळीबार केला, आणि अनेक कामगार तसेच पोलीस अधिकारी ठार झाले. या घटनेला ‘हेमार्केट हत्याकांड’ असे म्हणतात. या घटनेनंतर जगभरातील कामगार चळवळींना एक तीव्र आवेग मिळाला आणि कामगारांच्या हक्कांसाठीचा लढा अधिक व्यापक झाला. १८८९ साली पॅरिस येथे भरलेल्या ‘दुसऱ्या आंतरराष्ट्रीय कामगार परिषदे’त १ मे हा दिवस जागतिक कामगार दिन म्हणून पाळण्याचा निर्णय घेण्यात आला. तेव्हापासून जगभरातील कामगार संघटना, डाव्या विचारसरणीच्या पक्षांनी आणि समाजवादी चळवळींनी हा दिवस मोठ्या उत्साहाने साजरा करण्यास सुरुवात केली. या दिवशी कामगारांचे मोर्चे निघतात, सभा होतात, त्यांच्या हक्कांची चर्चा होते आणि शोषणमुक्त समाजाचे स्वप्न अधिक बळकट केले जाते.

भारतात कामगार दिनाची सुरुवात १ मे १९२३ रोजी मद्रास (आताचे चेन्नई) येथे झाली. ‘लेबर किसान पार्टी ऑफ हिंदुस्तान’चे नेते मलयापुरम सिंगारवेलू चेट्टियार यांनी पहिल्यांदा या दिवसाचा उत्सव भारतात आयोजित केला. त्यानंतर हळूहळू देशभर कामगार दिन साजरा होऊ लागला. महाराष्ट्रात तर हा दिवस अधिकच विशेष आहे. कारण याच दिवशी १९६० साली स्वतंत्र महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली.

स्वातंत्र्यानंतर भारताची भाषिक आधारावर प्रांतरचना करण्याचा प्रश्न ऐरणीवर आला. लोकांची मागणी होती की समभाषिक लोकांचे एकच राज्य असावे, म्हणजे प्रशासन, शिक्षण आणि न्याय यंत्रणा आपापल्या मातृभाषेत राबवता येतील. या मागणीसाठी देशभर चळवळी सुरू होत्या. आंध्र प्रांताने वेगळ्या तेलुगू राज्यासाठी आंदोलन केले आणि पोट्टी श्रीरामुलू यांच्या बलिदानानंतर १९५३ साली आंध्रप्रदेश स्थापन झाले. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने डिसेंबर १९५३ मध्ये न्यायाधीश फझल अली यांच्या अध्यक्षतेखाली ‘राज्य पुनर्रचना आयोग’ स्थापन केला. या आयोगाने १९५५ मध्ये आपला अहवाल सादर केला. मात्र या अहवालात मुंबई शहराच्या बाबतीत एक अत्यंत वादग्रस्त शिफारस केली गेली. मुंबई हा केंद्रशासित प्रदेश असावा, किंवा मराठी व गुजराती या दोन्ही भाषिकांचे एकत्र ‘द्विभाषिक राज्य’ असावे, असे सुचवण्यात आले. या शिफारशीमागे अनेक राजकीय आणि आर्थिक कारणे होती. त्या काळी मुंबई हे आजच्यासारखेच देशाचे सर्वात मोठे औद्योगिक आणि व्यापारी केंद्र होते. गुजराती भांडवलदार, व्यापारी आणि उद्योजकांचे मुंबईवर मोठे वर्चस्व होते. केंद्रातील काही नेते मुंबई गुजरातला जोडण्याच्या बाजूने होते. मोरारजी देसाई, जे स्वतः गुजरातचे होते, ते तत्कालीन प्रभावशाली नेते होते आणि त्यांनी द्विभाषिक राज्याचा आग्रह धरला. मुंबई महाराष्ट्राला मिळणार नाही असेही जाहीर वक्तव्य केले गेले होते. हा निर्णय मराठी जनतेला अत्यंत अन्यायकारक वाटला आणि त्यातूनच संयुक्त महाराष्ट्र चळवळीला ऊर्जा मिळाली.

संयुक्त महाराष्ट्र चळवळ हे केवळ एक राजकीय आंदोलन नव्हते. ती एक व्यापक सामाजिक, सांस्कृतिक आणि भाषिक अस्मितेची लढाई होती. या चळवळीने महाराष्ट्रातील विविध जाती, वर्ग, समाजगट, कामगार, शेतकरी, विद्यार्थी, साहित्यिक, पत्रकार आणि सामान्य नागरिक यांना एकत्र आणले. मराठी माणसाच्या हृदयात खोलवर रुजलेल्या मातृभाषेच्या आणि मातृभूमीच्या प्रेमाने हे सारे एकत्र आले होते. १९५५-५६ या काळात ‘संयुक्त महाराष्ट्र समिती’ची स्थापना झाली. या समितीमध्ये डाव्या पक्षांच्या कम्युनिस्टापासून ते उजव्या विचारसरणीच्या जनसंघापर्यंत विविध विचारसरणींचे पक्ष सामील झाले. शेतकरी कामगार पक्ष, प्रजा समाजवादी पक्ष, हिंदू महासभा, हे सारे एकत्र आले होते. एरवी एकमेकांशी वैचारिकदृष्ट्या विरोध करणाऱ्या या पक्षांनी मराठी माणसाच्या हक्कासाठी हातात हात मिळवले. हे या चळवळीचे एक अत्यंत महत्त्वाचे वैशिष्ट्य होते. या चळवळीला मराठी साहित्यिक आणि कलाकारांचीही साथ होती. आचार्य अत्रे यांनी आपल्या ‘मराठा’ या वृत्तपत्रातून अत्यंत तेजस्वी आणि प्रखरपणे या चळवळीची बाजू मांडली. त्यांच्या लेखांनी, वक्तृत्वाने आणि व्यंगचित्रांनी जनमत प्रचंड प्रमाणात ढवळले गेले. एस. एम. जोशी, श्रीपाद अमृत डांगे, प्रबोधनकार ठाकरे असे अनेक दिग्गज नेते या लढ्याचे आधारस्तंभ बनले. ही चळवळ मराठी समाजाच्या सामूहिक जागृतीचे प्रतीक होती. ग्रामीण महाराष्ट्रापासून ते मुंबईच्या गिरणगावातील कामगारापर्यंत, आणि पुण्याच्या विद्यापीठातून ते विदर्भाच्या शेतकऱ्यापर्यंत सर्वांची या चळवळीशी नाळ जोडली गेली होती. हे एक खालून वर उठलेले, जनसामान्यांनी उभे केलेले ‘लोकसत्ताक’ आंदोलन होते.

१९५५ ते १९६० या कालखंडात संयुक्त महाराष्ट्राच्या मागणीसाठी मुंबईत अनेक आंदोलने झाली. जनआंदोलन आणि सरकारी दडपशाही यांचा संघर्ष टोकाला पोहोचला होता. या काळात पोलिसांनी आंदोलकांवर गोळीबार केला. या गोळीबारात १०५ निरपराध मराठी नागरिक शहीद झाले. त्यांचे बलिदान व्यर्थ गेले नाही. कारण नंतर त्यांच्या रक्ताने महाराष्ट्राचा नकाशा लिहिला गेला. हे हुतात्मे कोण होते? कामगार, तरुण, विद्यार्थी असलेली ती सामान्य माणसे होती. ते रस्त्यावर उतरले होते, कारण त्यांना आपल्या मातृभाषेचा, आपल्या मुंबईचा आणि आपल्या महाराष्ट्राचा अभिमान होता. मुंबईतील फ्लोरा फाउंटन जवळ असलेल्या हुतात्मा चौकाचे नाव या शहीदांच्या स्मृतीस वाहिले गेले आहे. दरवर्षी १ मे रोजी या चौकात हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहिली जाते आणि महाराष्ट्र त्यांचे ऋण मानतो. या बलिदानांनी केंद्र सरकारलाही हादरवले. जनतेच्या रोषाची तीव्रता लक्षात घेऊन, आणि या आंदोलनाची व्यापकता पाहून, पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने आपली भूमिका बदलली. द्विभाषिक राज्याची कल्पना सोडून मुंबईसह महाराष्ट्र आणि स्वतंत्र गुजरात या दोन राज्यांची निर्मिती करण्याचा निर्णय झाला; आणि १ मे १९६० हा महाराष्ट्राच्या इतिहासातील सोनेरी दिवस उगवला. याच दिवशी ‘महाराष्ट्र राज्य पुनर्रचना कायदा १९६०’ अंमलात आला आणि मुंबईसह महाराष्ट्र राज्याचा जन्म झाला. कोकण, देश, विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र या विविध भागांतील मराठी भाषिकांचे एक राज्य झाले. ही केवळ एक प्रशासकीय घटना नव्हती, तर ते मराठी माणसाच्या दीर्घ संघर्षाचे फलित होते.

याच दिवशी जागतिक कामगार दिन असणे हा तर ऐतिहासिकदृष्ट्या अर्थपूर्ण योगायोग आहे. कारण संयुक्त महाराष्ट्र चळवळ ही एका अर्थाने कामगार वर्गाचीच चळवळ होती. मुंबईच्या गिरण्यांमध्ये राबणारा मराठी कामगार, कापड गिरण्यांतील मजूर, बंदरावर काम करणारे मजूर, हे या आंदोलनाचा कणा होते. त्यांच्या घामाने आणि रक्ताने महाराष्ट्र उभा राहिला. यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री बनले. त्यांनी या नव्या राज्याचा पाया घालण्याचे महत्त्वाचे कार्य केले. नव्या महाराष्ट्राचे स्वप्न साकार करणे, विकासाची दिशा ठरवणे आणि विविध जातींना एकत्र बांधणे हे त्यांच्यापुढील मोठे आव्हान होते. महाराष्ट्र हे कृषिप्रधान राज्य असले तरी मुंबईमुळे ते देशाचे आर्थिक केंद्रही राहिले आहे.

महाराष्ट्राची निर्मिती झाली खरी, परंतु ती अपूर्ण होती. बेळगाव, धारवाड, विजापूर, कारवार आदी भागातील मराठी भाषिक प्रदेश कर्नाटकात समाविष्ट केले गेले. हा महाराष्ट्रावरील एक मोठा अन्याय होता आणि आजही हा प्रश्न सुटलेला नाही. बेळगाव शहरात मराठी भाषिकांची संख्या मोठी आहे, तरीही ते कर्नाटकात आहे. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी ५ जून १९६० रोजी चार सदस्यांची एक समिती नेमण्यात आली. या समितीने ‘पाटसकर फॉर्मुला’ वापरण्याची शिफारस केली. या फॉर्मुल्यानुसार गाव हा घटक मानून, ज्या गावात ५०% पेक्षा जास्त एका भाषेचे लोक राहतात, ते गाव त्या भाषिक राज्याला द्यावे, असे ठरले. मात्र हा फॉर्मुला अमलात आणण्यात अपयश आले. पुढे १९६६ साली माजी सरन्यायाधीश मेहेरचंद महाजन यांची एकसदस्य आयोग नेमण्यात आला. महाजन आयोगाने आपला अहवाल सादर केला ज्यात निपाणी, खानापूर यांसह २६४ गावे महाराष्ट्राला आणि अक्कलकोटसह २२७ गावे कर्नाटकाला देण्याची शिफारस केली. मात्र या आयोगाने बेळगाव महाराष्ट्राला देण्याची शिफारस केली नाही. हे महाराष्ट्राला मान्य नव्हते. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने महाजन आयोगाच्या शिफारसी एकमुखाने फेटाळून लावल्या. बेळगावचा प्रश्न आजही तीव्र आहे. ‘महाराष्ट्र एकीकरण समिती’ या संघटनेने या लढ्याचे नेतृत्व केले आहे आणि आजही करत आहे. संयुक्त महाराष्ट्राची मोहीम यशस्वी झाल्यानंतर ही समिती थोडी मोडकळीस आली असली तरी ती अजूनही आपले काम करत आहे. बेळगावमध्ये मराठी शाळा, मराठी संस्कृती आणि मराठी अस्मिता जिवंत ठेवण्यासाठी हे कार्यकर्ते अथक परिश्रम करत आहेत. सर्वोच्च न्यायालयात हा प्रश्न विविध याचिकांद्वारे गेला आहे. केंद्र सरकारने वेळोवेळी मध्यस्थी करण्याचे प्रयत्न केले. परंतु कर्नाटक सरकार बेळगाव सोडण्यास तयार नाही. कर्नाटकाने तर बेळगावचे नाव ‘बेलगावी’ असे कन्नड पद्धतीने बदलले आणि तेथे कर्नाटक विधानसभेचे अधिवेशन भरवण्यास सुरुवात केली. या सगळ्यामुळे मराठी मनात संताप आहे.

महाराष्ट्र आज देशातील औद्योगिक आणि आर्थिकदृष्ट्या प्रगत राज्यांपैकी एक अव्वल दर्जाचे राज्य आहे. मुंबई ही भारताची आर्थिक राजधानी आहे. माहिती तंत्रज्ञान, वित्त, मनोरंजन, उत्पादन उद्योग या क्षेत्रांत महाराष्ट्राने देशात आघाडी घेतली आहे. पण या विकासासोबतच मराठी माणसाचे, सामान्य कामगाराचे, शेतकऱ्याचे जीवनमान कसे उंचावेल हा प्रश्न अजूनही समोर उभा आहे. कामगार दिनाच्या निमित्ताने आज हे विचारणे अत्यंत आवश्यक आहे की, ज्या कामगारांनी या राज्यासाठी लढा दिला, ज्यांच्या खांद्यावर मुंबईची आणि महाराष्ट्राची अर्थव्यवस्था उभी आहे, ते कामगार आज किती सुरक्षित आहेत? गिरण्या बंद पडल्या, कामगारांच्या वस्त्या उद्ध्वस्त झाल्या, रोजगाराच्या संधी कमी झाल्या. या प्रश्नांची उत्तरे शोधणे हे महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने औचित्यपूर्ण ठरणारे आहे.

त्या काळी मुंबईतील कापड गिरण्यांमध्ये लाखो मराठी कामगार काम करत होते. ते मूळचे कोकणातून, देशावरून आलेले होते. त्यांनी मुंबई घडवली होती. पण मुंबईत त्यांची गणना ‘परके’ म्हणून होत होती. मुंबई महाराष्ट्राला मिळावी ही त्यांची मागणी केवळ भावनिक नव्हती, तर ती त्यांच्या अस्तित्वाचीही मागणी होती. आपल्या कामाच्या ठिकाणावर आपल्या भाषेत बोलण्याचा, आपल्या संस्कृतीत राहण्याचा हक्क मागणे हे चुकीचे कसे म्हणता येईल? कार्ल मार्क्सने सांगितले होते की कामगार वर्गाला मातृभूमी नसते, परंतु भारताच्या संदर्भात हे सूत्र पुरेसे नाही. येथे भाषा, संस्कृती आणि प्रांत यांचा प्रश्न फक्त वर्गीय प्रश्नाशी गुंफलेला नाही. मराठी कामगाराला त्याची मराठी भाषा, त्याची महाराष्ट्रीय संस्कृती यांच्याशी जोडलेले राहणे आवश्यक होते. या दोन्ही संघर्षांचा — वर्गसंघर्ष आणि अस्मितासंघर्ष — यांचा मिलाफ म्हणजेच १ मे. आचार्य अत्रे, एस. एम. जोशी, डांगे हे नेते एकाच वेळी कामगार हक्कांचे पुरस्कर्ते आणि मराठी अस्मितेचे रक्षक होते. त्यांच्या दृष्टीत या दोन्ही गोष्टी परस्परविरोधी नव्हत्या, तर त्या एकमेकांच्या पूरक होत्या. शोषणमुक्त समाजात भाषिक न्याय असतो, आणि भाषिक न्यायाच्या समाजात वर्गीय शोषण असता कामा नये, हेच सूत्र होते.

आज महाराष्ट्र दिनाचा उत्सव साजरा करताना आपण काही प्रश्नांना सामोरे जाणे आवश्यक आहे. महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्या, मराठी माध्यमाच्या शाळांची घसरण, रोजगाराचे प्रश्न, ग्रामीण-शहरी विषमता, भाषेचे राजभाषा म्हणून स्थान काय आहे, हे सारे प्रश्न अनुत्तरित आहेत. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळणे हे एक मोठे यश आहे. पण हा दर्जा कागदावर राहू नये. मराठी शाळा, मराठी विद्यापीठे, मराठी साहित्य संस्था यांना बळ देणे, मराठी तंत्रज्ञान विकसित करणे, हे सरकार आणि समाज दोघांचेही कर्तव्य आहे. ज्या हुतात्म्यांनी महाराष्ट्रासाठी प्राण दिले, त्यांचे स्वप्न साकार करण्यासाठी मराठी समाजाने सतर्क आणि संघटित राहणे गरजेचे आहे. त्याचवेळी बेळगाव आणि सीमाभागातील मराठी जनतेशी एकजूट राखणे हे देखील महाराष्ट्राचे कर्तव्य आहे. त्यांची भाषा, त्यांची संस्कृती, त्यांची शिक्षणाची व्यवस्था जोपासणे, त्यांच्या न्यायासाठी लढा देत राहणे हे संयुक्त महाराष्ट्राची अपूर्ण मागणी पूर्ण करण्याचाच एक भाग आहे.

एवंच संयुक्त महाराष्ट्र चळवळ हा भारतीय लोकशाहीतील एक उज्ज्वल अध्याय आहे. सामान्य माणसांनी संघटित होऊन, बलिदान देऊन, एका अन्यायाविरुद्ध यशस्वी लढा दिला, हे या चळवळीचे सार आहे. हे स्मरण आपल्याला सांगते की लोकशाहीत जागरूक नागरिकांचे सामूहिक बल हे सर्वात मोठे शस्त्र आहे. म्हणूनच प्रत्येक मराठी माणसाने — विशेषतः तरुण पिढीने — या दिवसाचे महत्त्व जाणले पाहिजे. हुतात्म्यांचे स्मरण करणे म्हणजे केवळ श्रद्धांजली वहाणे नव्हे; तर एक जबाबदारी स्वीकारणे आहे. महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी, मराठी माणसाच्या सन्मानासाठी आणि न्यायपूर्ण समाजाच्या निर्मितीसाठी कायम जागरूक आणि सक्रिय राहणे हेच खरे महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाचे फलित असायला हवे.

© श्री जगदीश काबरे

(लेखक विज्ञान आणि वैज्ञानिक दृष्टीकोन प्रसारक आहेत.)

jetjagdish@gmail. com

मो ९९२०१९७६८०

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ मला समजलेली संत तुकारामांची गाथा… भाग – १८ ☆ सुश्री अरुणा मुल्हेरकर ☆

सुश्री अरुणा मुल्हेरकर

? विविधा ?

☆ मला समजलेली संत तुकारामांची गाथा… भाग – १८ ☆ सुश्री अरुणा मुल्हेरकर ☆

सत्संग- सज्जन प्रशंसा (२)

महाराजांना संतांच्या रूपात  प्रत्यक्ष पांडुरंग दिसतो. त्यांचे म्हणणे असे आहे की, गृहस्थाने देवाची पूजा करत असताना जर घरी कोणी संत मंडळी आली तर पूजा बाजूला ठेवून संतांची यथासांग पूजा करावी. प्रथम त्यांचा आदर करावा मग पूजा करण्यास घेतलेला देव शाळीग्राम असो, नाहीतर प्रत्यक्ष विष्णूची मूर्ती असो. मूर्ती पूजेच्या ऐवजी देवस्वरूप असणाऱ्या संतांचे पूजन हा धर्म आहे.

 धन्य ते संसारी/ दयावंत जे अंतरी/

 येथे उपकारासाठी/ आले घर ज्या वैकुंठी//

 लटिके वचन/ नाही देही उदासीन/

 मधुरा वाणी होटी / तुका म्हणे वाव पोटी//

संत गण, सज्जन, म्हणजे कसे असतात  याचे  वर्णन वरील अभंगात तुकाराम महाराज करतात. या लोकांच्या अंतःकरणात दया असते, म्हणून ते धन्य आहेत. कोणा परक्याला ठेच लागली तरी संतवृत्तीच्या माणसांच्या डोळ्यात टचकन पाणी येते. यांचे वास्तविक वैकुंठ हेच निवासस्थान आहे, परंतु केवळ परोपकार बुद्धीने ही माणसे लोकांमध्ये येतात. ते कधीही खोटे बोलत नाहीत, खोटी वचने देत नाहीत, त्यांची वाणी नेहमी मधुर आणि रसाळच असते. लोकांचे गुणदोष सामावून घेण्याइतके त्यांचे मन मोठे असते. त्यांची वृत्ती क्षमाशील असते. दुसऱ्याचे सुख तेच त्यांचे सुख. स्वतःच्या देहासंबंधी ते पूर्णतः उदासीन असतात.

 अशा संतांचा संग लागणे, यासाठी प्रारब्ध ही अनुकूल असावे लागते, सर्वांनाच संत संगतीचा लाभ होतोच असे नाही.

 जेथे जावे तेथे कपाळ सरिसे/

 लाभ तो विशेष संत संगे//

 पूर्वपुण्य जरी होती सानकूळ/

 अंतराय मूळ नुपजे तेथे//

 भाग्य तरी नव्हे/ धन पुत्र दारा/

निकट वास बरा/ संतापाई//

 तुका म्हणे हेचि करावी मिरासी/

 बळी संतांपाशी द्यावा जीव//

महाराज देवाजवळ एकच मागणे  मागतात की देवा, मला संतांची संगती लाभू दे. त्यांचा असा विश्वास आहे की दैव अनुकूल नसले, तरी संतांच्या सहवासात ते अनुकूल करता येईल. कारण चांगल्या संगतीचा परिणाम चांगलाच होणार. पत्नी, पुत्र,द्रव्य, एकूणच हा एक संसार म्हणजेच भाग्य असा सर्वसामान्यांचा विश्वास असतो,

परंतु महाराजांच्या मते संतांच्या चरणाशी आपण कायम राहावे, त्यांची सेवा करावी, त्यांच्यापाशी जीवही अर्पण करावा, तरच सद्गती लाभेल. दोऱ्यात ओवलेल्या सुगंधी फुलांच्या गंधाने  दोराही सुगंधित होतो.

संत, सज्जन, ज्ञानी माणसांइतके महान कोणी नाही हे तुकाराम महाराज त्यांच्या अनेक अभंगांतून सतत सांगत आहेत. त्याच आशयाच्या या अभंगाचा आपण थोडा विचार करू.

 परमार्थी  तो न म्हणावा आपुला/

 सलगी धाकूला हेळू नये/

 थोडाची स्फुल्लिंग बहुत दावाग्नी/

 वाढता इंधनी वाढविला/

 पितियाने तैसा वंदावा कुमर/

 जयाचे अंतर देव वसे/

 तुका म्हणे शिरी वहावे खापर/

 माजी असे सार नवनीत//

जो कोणी परमार्थी असेल, ब्रह्मनिष्ठ असेल, तो वयाने लहान असला तरी त्याची अवहेलना करू नये. तू लहान आहेस, तुला काय कळतंय असे बोलणे साफ चुकीचे आहे.  वयाच्या सोळाव्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहून गीतेचे ज्ञान सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविणारे ज्ञानेश्वर महाराज यांना आपण माऊली म्हणून का बरे वंदन करतो? या ठिकाणी तुकाराम महाराजांनी अगदी योग्य असे दृष्टांत दिले आहेत.

ते म्हणतात की अग्नीची ठिणगी लहान असली तरी लाकडाच्या योगाने मोठ्या अग्नीचे स्वरूप धारण करते. तशी परमार्थाची स्थिती आहे. ज्याच्या अंतःकरणात नित्य देवाची वस्ती असते अशा मुलाला पित्यानेही नमस्कार करावा. लोण्याचे भांडे मातीचे असले तरी डोक्यावरून वाहून नेतात, त्याचप्रमाणे ज्ञानी, वयाने लहान असला किंवा हलक्या कुळातला असला तरी तो वंदनीय आहे. सावता, माळी होता, चोखा, महार होता, नामदेव, शिंपी होता, गोरा, कुंभार होता, परंतु हे सर्व वृत्तीने संत होते, महात्मे होते, म्हणूनच वंदनीय आहेत.

देहरूपी मलीन झालेली चादर कोणत्याही साबणाने स्वच्छ करता येत नाही. संतांच्या सहवासात राहून त्यांच्या वचनानुसार वर्तन करणे हा एकच मलीनता नष्ट करण्याचा उपाय आहे, हे जाणून अत्यंत नम्रतेने तुकाराम महाराज या संत सज्जनांना उद्देशून म्हणतात…….

 पाळीतो वचन/ परी बहु भिते मन/

 करितो पायांशी सलगी/ नये बैसो अंग संगी//

 जोडोनिया कर/ उभे असावे समोर/

 तुका म्हणे संत/ तुम्ही मी बहु पतीत//

मी तुमच्या वचनाप्रमाणे जरी वागत असलो, तरी मला फार भीती वाटते, कारण माझी ती योग्यताच नाही. तुमच्या पंगतीत मी बसू शकत नाही, म्हणून तुमच्या पायाशीच मी बरा. तुमच्यासमोर हात जोडून उभे राहावे हीच माझी योग्यता आहे. अहो संत सज्जन हो, तुम्ही खरोखरच फार थोर आहात, आणि मी पापी आहे. विनम्र बुद्धी असली तरच माणूस मोठा होऊ शकतो हे तुकारामांना या अभंगातून सांगायचे आहे.

संत महिमा इतका मोठा आहे, की तुकाराम महाराज म्हणतात, संतांवर माझा सर्व भार टाकून मी निश्चिंत झालो आहे. संतांनीच मला विठ्ठलाच्या स्वाधीन केले.

  घालुनिया भार राहीलो निश्चिंती/

 मिरविले संती विठोबासी//

 लावूनिया हाता कुरवाळिला माथा/

 सांगितले चिंता/ न करावी//

 कटी कर समचरण साजिरे/

 राहिला मी बरे तीरी उभा//

 खुंटले सायास आणिक या जीवा/

 धरीले केशवा पाय तुझे//

 तुज वाटे आता ते करी अनंता/

 तुका म्हणे संता लाज माझी//|

संतांनी( विठ्ठलाने) माझ्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला, मला कुरवाळले, माझ्या सर्व चिंता दूर केल्या. मला भयमुक्त केले. कमरेवर हात आणि समचरण ठेवून तो माझा विठू भीमेच्या तीरावर उभा आहे. त्याचे पाय धरल्यामुळे माझे सर्व कष्ट नाहीसे झाले. हे अनंता, तुझ्या इच्छेप्रमाणे तू मला जसे ठेवशील तसा मी राहीन कारण माझी लाज राखणारे संतच आहेत.

संतांची संगती आयुष्यात फार महत्त्वाची आहे. संत हेच गुरु आहेत, संत हेच सन्मार्गदर्शक आहेत. गाथेतील अभंगांतून वर्णिलेला संत महिमा, गाथा वाचताना जागोजागी दिसून येतो. मी घडविले ते एक विहंगावलोकन!

क्रमशः… १८

© सुश्री अरुणा मुल्हेरकर 

डेट्राॅईट (मिशिगन) यू.एस्.ए.

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ मला समजलेली संत तुकारामांची गाथा… भाग – १७ ☆ सुश्री अरुणा मुल्हेरकर ☆

सुश्री अरुणा मुल्हेरकर

? विविधा ?

☆ मला समजलेली संत तुकारामांची गाथा… भाग – १७ ☆ सुश्री अरुणा मुल्हेरकर ☆

सत्संग-सज्जन प्रशंसा

परमेश्वर प्राप्तीसाठी नामस्मरण, भक्ती, सेवाभाव याबरोबरच सत्संग या गोष्टीला तितकेच महत्त्व दिल्याचे आपल्याला गाथेतील  अभंगांतून दिसून येते. उच्च समजल्या जाणाऱ्या ब्राह्मण वर्गातील काही  मंडळींकडून तुकाराम महाराजांना अतिशय त्रास दिला जात होता. आम्ही वेद पंडित, शास्त्राचा अभ्यास केलेले, म्हणून आम्हीच अध्यात्माचे जाणकार असे समजून जे समाजातील खालच्या वर्गाचे समजणाऱ्या लोकांना फार पीडा देत असत अशा पाखंडी वर्गावर तुकाराम महाराजांनी त्यांच्या अभंगातून चांगलेच ताशेरे मारले आहेत.

ब्राह्मण असो की वैश्य असो अथवा शूद्र, संत सज्जन कोणाला म्हणावे हे सांगताना तुकाराम महाराज म्हणतात,

हिरा ठेविता ऐरणी/ वाचे मारिता जो घणी /

 तोची मोल यावे खरा/ करणीचा होय चुरा//

 मोहरा तोची अंगे/ सूत न जळे ज्याचे संगे/

 तुका म्हणे तोचि संत/ सोसो जगाचे आघात//

संत कसे असतात तर, जो हिरा ऐरणीवर ठेवून मोठ्या हातोड्याने त्याच्यावर घाव घातला तरी फुटत नाही. तोच हिरा

मौल्यवान आहे दुसरे इतर बनावट काचेचे तुकडे असतात कारण ते घाव घालताच त्यांचा चुरा होतो. ज्याला सूत गुंडाळून अग्नीत टाकले असता सूत जळत नाही तोच खरा मोहरा होय. त्याचप्रमाणे जो जगाने दिलेले सर्व प्रकारचे उपद्रव शांतपणे सहन करतो त्याला संत म्हणावे.

ते संतांचा महिमा वर्णन करतात.

 सकळ चिंतामणी शरीर/ जरी जाय अहंकार समूळ आशा/

 निंदा हिंसा नाही कपट देह बुद्धी/ निर्मळ स्फटिक जसा.//

 मोक्षाचे तीर्थ न लगे वाराणसी/ येती तया पासी अवघे जन//

 तीर्थासी तीर्थ झाला तोची एक/ मोक्ष तेणे दर्शने//

 मन शुद्ध तया काय करीसी माळा/

 मंडित सकळा भूषणासी//

 हरीच्या गुणे गर्जताती सदा/

 आनंद तया मानसी//

 तन मन धन दिले पुरुषोत्तम/ आशा नाही कवणाची//

 तुका म्हणे तो परीसाहुनी आगळा/

 काय महिमा वर्णू त्याचा//

या अभंगात तुकारामांनी संतांची लक्षणे सांगितली आहेत. चित्त शुद्ध असलेल्या संतांबद्दल तुकाराम महाराज गौरवाने बोलत आहेत की ज्याचा अहंकार गेला  आहे, निंदा, हिंसा, कपट, देह बुद्धी याचा वास त्यांच्यात नाही तोच स्फटिकासारखा निर्मळ आहे, त्याचे सर्व शरीर चिंतामणीच आहे. मोक्ष देणारे तीर्थ काशी, तिची त्याला जरुरी नाही. कारण सर्व तीर्थांना पावन करणारा संत हाच तीर्थस्थान झालेला आहे. सर्व जग अशा पुरुषापाशीच येते. याच्या दर्शनानेच मोक्षाचा लाभ होतो. ज्याचे मन शुद्ध झाले आहे त्याला जपमाळेसारख्या बाह्य चिन्हांची काहीही जरुरी राहिलेली नाही. मन शुद्ध असल्यानेच तो सर्व भूषणांनी मंडित झालेला आहे. जे हरीचे गुणगान करत असतात ते निरंतर आनंदातच असतात.त्यांनी स्वतःला पुरुषोत्तमाच्या ठायी अर्पण केले आहे आणि जो कोणावरही आशा ठेवत नाही तो परिसापेक्षाही श्रेष्ठ आहे. त्याचा महिमा शब्दात वर्णन करता येत नाही. संतांच्या दर्शनाने तापत्रयांचा नाश होऊन विश्रांती मिळते.

 

 शुद्ध बीजापोटी/ फळे रसाळ गोमटी/

 मुखी अमृताची वाणी/ देह देवाचे करणी//

 सर्वांग निर्मळ/ चित्त जैसे गंगाजळ/

 तुका म्हणे जाती/ ताप दर्शनी विश्रांती

 

बीज शुद्ध असले की त्यातून उगवणारी फळे रसाळ आणि गोडच असतात, असं सांगून संत तुकाराम पुढे म्हणतात की ज्याच्या मुखात अमृततुल्य गोड शब्द आहेत आणि ज्याचा देह देवकार्यासाठी वापरला जात आहे, ज्याचे चित्त गंगाजळाप्रमाणे पवित्र आहे त्याच्या दर्शनाने त्रिविध ताप हरण होऊन चित्ताला विश्रांती मिळते.

 सोनियाचे ताट क्षीरीने भरिले/

 भक्षावया दिले श्वानालागी//

 मुक्ताफळ हार खराशी घातला/

 कस्तुरी सुकराला चोजविली//*

 वेद पारायण बधिरा सांगे ज्ञान/

 तयाची ते खूण काय जाणे//

 तुका म्हणे ज्याचे तोची एक जाणे/

 भक्तीचे महिमान साधू जाणे//

एक संत साधूच असा आहे की जो भक्तीचा महिमा जाणतो. सामान्यांना हे पटवून देण्यासाठी तुकाराम महाराज या अभंगात रोजच्या जीवनातील काही उदाहरणे देतात.

सोन्याच्या पात्रात खीर भरून ती कुत्र्याला दिली तर त्याचा काय उपयोग? त्याचप्रमाणे गाढवाच्या गळ्यात मोत्याचा हार घातला किंवा डुकराच्या नाकाला कस्तुरी लावली

तर त्याचा महिमा त्यांना कळणार आहे का? एखाद्या बहिर्‍याला(अज्ञानी) माणसाला वेदाचे ज्ञान कितीही देण्याचा प्रयत्न केला तरी ते त्याच्या बुद्धीला समजणार आहे का? जे खरे वर्म आहे ते ज्याचा तोच जाणू शकतो. याच कारणास्तव संतांची संगती धरावी असे तुकाराम महाराजांचे सांगणे आहे.

तुकाराम महाराजांना वैष्णवांचे दास होण्याची तळमळ लागली आहे. कारण ते म्हणतात.

 ते माझे सोयरे सज्जन सांगाती/

 पाय आठवीती विठोबाचे//

 येरा मानविधी पाळणा पुरते/

 देवाची ती भुते म्हणोनिया//

 सर्व भावे जालो वैष्णवांचा दास/

 करीन त्यांची आस उच्छिष्ठाची//

 तुका म्हणे जैसे आवडती हरिदास/

 तैसी नाही आस आणिकांची//

तुकाराम महाराजांच्या मनात हरिदासांविषयी अत्यंत आदर आहे. जे पांडुरंगाच्या चरणांचे चिंतन करतात ते सज्जन माझे सोयरे आहेत असे ते म्हणतात.

बाकीच्यांना मी फक्त विधीपालनापुरते आदराने वागवतो कारण सर्व भूतमात्र देवाच्याच रूपाचे असतात. काया, वाचा, मनाने मात्र तुकाराम महाराज वैष्णवांचे दास आहेत. त्यांच्या उच्छिष्टाची महाराज आशा धरतात. त्यांना हरिदास जितके आवडतात तितके इतर कोणीही आवडत नाही. या अभंगात पर्यायाने सज्जनांची संगती चांगली हे सांगण्याचा महाराजांचा आटोकाट प्रयत्न आहे.

संतांची महती सांगणारा हा आणखी एक अभंग आपण पाहूया.

 काय वाणू आता न पुरे हे वाणी/

 मस्तक चरणी ठेवीतसे//

संत महात्म्य वर्णन करताना महाराजांची वाणी अपुरी पडते. त्यांच्या चरणावर मस्तक ठेवून ते म्हणतात,

 थोरीव सांडली आपुली परिसे/

 नेणे सिवो कैसे लोखंडासी//

 जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती/

 देह कष्टविति पर उपकारे//

 भुतांची दया हे भांडवल संता/

 आपुली ममता नाही देही//

 तुका म्हणे सुख पराविया सुखे/

 अमृत हे मुखे स्त्रवतसे//

लोखंड अति हीन आहे, त्याला मी कसा स्पर्श करू? असे मनात न आणता परीस त्याचे सोने करतो, त्याचप्रमाणे संतांनी माझ्या सारख्या हीनाचा स्वीकार केला आहे. संतांचे अवतार जगाच्या कल्याणा करताच असतात, ते आपला देह परोपकार करण्यासाठी कष्टवितात. सर्वांवर दया करणे, हे संतांचे स्वाभाविक भांडवल आहे व त्यांना स्वतःच्या देहाची ममता नसते.

ते संत लोकांच्या सुखामुळेच सुखी होतात आणि त्यांचे बोलणे अमृता सारखे मधुर असते. हरीच्या नामामृताचा ओघच त्यांच्या वाणी वाटे वाहत असतो.

पुढील भागात सज्जन प्रशंसे विषयी आणखी काही अभंगांचा आपण विचार करू.

क्रमशः… १६ 

© सुश्री अरुणा मुल्हेरकर 

डेट्राॅईट (मिशिगन) यू.एस्.ए.

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ तो आणि मी…! – भाग १०१ ☆ श्री अरविंद लिमये ☆

श्री अरविंद लिमये

? विविधा ?

☆ तो आणि मी…! – भाग १०१ ☆ श्री अरविंद लिमये ☆

(पूर्वसूत्र- डॉ. परांजपे हे आमचे फॅमिली डॉक्टर. त्यांच्याशी ताईच्या प्रॉब्लेमबद्दल मोकळेपणाने बोलून मनावरचं ओझं हलकं करावसं वाटलं. त्यांना फोन करून मी त्यांच्या भेटीची लगेचची वेळ ठरवली, तेव्हा मनातला अंधार दूर करणारा त्यांच्या रूपातला एक आशेचा किरण तोवर अंधारात चाचपडणाऱ्या मला पुढं पाऊल टाकण्याची प्रेरणा देत होता! )

“तुम्ही त्यांचे रिपोर्टस् मला दाखवण्याची व्यवस्था करू शकाल कां? त्यांनाही इथे घेऊन येऊ शकलात तर बोटाची जखमही मला तपासता येईल. ” डॉक्टर म्हणाले. ते रास्तही होतंच. पण हे सगळं जमवता येईल कां हा मात्र प्रश्न होता. याला कारणही तसंच होतं.

तो शनिवार होता. तसंही मी आज ताईला भेटायला कोल्हापूरला जाणार होतोच. त्यामुळे सगळ्या रिपोर्टसच्या झेराॅक्स काॅपीज् आणणं कठीण नव्हतं. पण ताईला कसं आणायचं? मुळात तिकडे आॅपरेशनची तारीख ठरवण्यापूर्वी दुसऱ्या एका आॅर्थोपेडीकचे सेकंड ओपिनियन घेतलेले होते. मग पुन्हा मुद्दाम सांगलीला तिला आणून दुसऱ्या एका डॉक्टरांचं मत विचारण्याची आवश्यकता नाही असं ताईच्या घरच्यांना वाटलं तर? आज मी दुपारनंतर तिथं जाऊन, सर्वांशी चर्चा करून निर्णय घ्यायचा म्हंटलं तरी लगोलग आजच ताईला आणणं शक्य कसं होणार? उद्या रविवार म्हणजे परांजपे डॉक्टरांचं क्लिनिकला उद्या सुट्टी आणि सोमवारी ऑपरेशनची तारीख आहे. मग करायचं काय?

यातून काही मार्ग निघेल याची शक्यता मला दुरास्पतच वाटत होती. मी डॉक्टरना ही अडचण सांगितली तेव्हा क्षणाचाही विचार न करता ते म्हणाले,

” ठीक आहे. त्या उद्या दुपारी ३ ते ४ च्या दरम्यान येऊ शकल्या तर त्यांना आमच्या घरी घेऊन या हवंतर. कांहीच प्राॅब्लेम नाही. “

मला गहन वाटणारा प्रश्न असा चुटकीसरशी सुटणं हा शुभशकूनच होता माझ्यासाठी! आणि आश्चर्य म्हणजे एखादं किचकट, अवघड वाटणारं गणित चुटकीसरशी सुटावं तशी पुढची सगळी सूत्रंही आपोआप हवी तशी विनाविलंब हलू लागली..!!

त्यादिवशी मी ठरल्याप्रमाणे ताईकडे गेलो. आम्ही ट्रीपला गेलेलो आहोत हेच गृहीत धरलेल्या सर्वांना माझं असं अचानक तिथं जाणं आश्चर्य वाटावं असंच होतं.

” तू? तुम्ही ट्रीपला गेला होतात ना? मग असं मधेच? ” ताईनं विचारलं.

ट्रीप अर्धवट कां सोडावी लागली ते मी थोडक्यात सांगितलं आणि मुख्य विषयालाच हात घातला.

“पण आलो ते बरंच झालं. कारण काल रात्री घरी आल्यावर सलिलकडून सोमवारी तुझं ऑपरेशन ठरल्याचं समजलं आणि.. “

“हो रे. बघ ना काय होऊन बसलंय.. ” ताई म्हणाली. मग पुढे त्याचीच चर्चा. उदय-योगिता म्हणजे ताईचा मुलगा न् सून.. , माझे मेहुणे यांच्याकडून हे सगळं कां, कसं झालं ते सविस्तर समजलं.

” भोग म्हणायचे आपले. दुसरं काय? तरी योग्य निदान लवकर झालं म्हणून बोटावरच निभावलंय. नाहीतर कांही खरं नव्हतं. ” ताई म्हणाली.

त्या सर्वांनी मनाविरूध्द का होईना पण सगळं स्वीकारलं होतं!

“मलाही ऐकलं तेव्हा धक्काच बसला होता. यातून कांहीतरी मार्ग निघेल या आशेने आज सकाळीच सांगलीतल्या डाॅ. परांजपेंची भेट घेऊन मी त्यांना हा प्राॅब्लेम सांगितलाय. ” असं म्हणून मी डाॅक्टर काय म्हणाले ते सविस्तर सगळं सांगून टाकलं.

“तुम्ही दुसऱ्या ऑर्थोपेडिकना रिपोर्टस् दाखवून आधीच त्यांचं सेकंड ओपिनियन घेतलंय ते गरजेचंच होतं. पण तरीही सोमवारी ऑपरेशन होण्यापूर्वी उद्याच ताईला घेऊन तुम्ही कुणीतरी सांगलीला माझ्याकडे येऊ शकलात तर आपण डॉक्टरांची त्यांच्या घरीच जाऊन भेट घ्यायचीय असं ठरलंय. त्यांचं घर आमच्या घरापासून जवळच आहे. मुख्य म्हणजे ते माझ्या माहितीतले एकमेव असे डॉक्टर आहेत ज्यांनी एम. डी. आयुर्वेद आणि एम. बी. बी. एस् अशा दोन्ही डिग्रीज् प्राप्त केलेल्या आहेत. त्यांच्या घरी आजोबांपासून आयुर्वेदाचं ज्ञान आणि वैद्यकी दोन्ही परंपरेने चालत आलेलं आहे. शिवाय यांची ऍलोपथीची डिग्रीही योग्य ट्रीटमेंट देण्यासाठी त्यांना उपयोगी पडतेय. ऑपरेशन शिवाय दुसरा कांहीच उपाय नाहीय असंही रिपोर्ट्स पाहून आणि जखम तपासून ते म्हणतील कदाचित, तरीही शेवटपर्यंत आपण प्रयत्न केला नाही असं नको ना व्हायला? काय करूया? ” मी विचारलं.

” कांहीच हरकत नाही. आम्ही आईला घेऊन उद्या येतो. ” उदयची ही लगेचची सकारात्मक प्रतिक्रिया माझ्यासाठी उत्साहवर्धक होती. मी सांगलीला परतलो.

दुसऱ्या दिवशी उदय आणि योगिता कारमधून ताईला घेऊन आले. डाॅ. परांजपेनी बोटाची जखम तपासली. सगळे रिपोर्टस् नजरेखालून घातले. आणि म्हणाले,

“मी ८०% खात्री देतो. बोट वाचेल. “

ऐकून माझ्या अंगावर शहाराच आला. हे सत्य कीं स्वप्न समजेचना. ताई, उदय, योगिता यांच्या मनातली भावनाही यापेक्षा वेगळी नव्हती.

आमच्या मनातली उरलेल्या २० टक्क्यांची अनिश्चितता कां? ही शंका आम्ही न सांगताच समजल्यासारखं डॉक्टर म्हणाले,

“८०% खात्री मी देतोय ती मी तुम्हाला सांगणार असलेल्या उपायांबद्दलची. बाकी २०% तुम्ही ते सर्व उपाय किती चिकाटीने आणि नियमित करु शकाल याच्यावर अवलंबून असेल. ” ते म्हणाले. हे कसं तेही त्यांनी आम्हाला सविस्तर समजावून सांगितलं.

‘ते सांगतील त्या पध्दतीने मसाज आणि बॅंडेज अनेक दिवस चिकाटीने करावं लागेल. त्यात घरच्या इतरांचीही मनापासूनची मदतही अत्यावश्यक आहे. शिवाय पेशंटचंही न कंटाळता सातत्यपूर्ण सहकार्य हवं. फरक अगदी हळूहळूच जाणवेल पण अखेर गुण येईल हे नक्की. ‘ हा त्यांच्या सविस्तर सांगण्याचा मतितार्थ होता!

” डाॅक्टर, बोटाला मसाज आणि बॅंडेज कसं, कधी आणि दिवसातून किती वेळा करायचं ते सांगा. मी ते कितीही दिवस करावं लागलं तरी नियमित करीन. आईही ते सगळं शांतपणे करुन घेणाऱ्या आहेत. आम्ही मॅनेज करू. ” योगिता मनापासून म्हणाली. ताईचं बोट वाचायची शक्यता आहे हेच ताईच्या घरच्या सगळ्यांसाठीच असं खूप महत्त्वाचं होतं!

“उद्याचं ऑपरेशन करायचं नाहीये हे त्या डॉक्टरना लगेच सांगायला हवं. ” उदय म्हणाला.

” हो ते सांगाच. प्रयत्नाचा एक भाग म्हणून आयुर्वेदीक ट्रीटमेंट घेणार आहोत हेही सांगून टाका. त्यात लपवण्यासारखं कांहीच नाहीय. शिवाय ऑपरेशन करायचं नाहीये असं नका म्हणू. ते थोडे दिवस पुढे ढकलूया असं सांगा. ” परांजपे डाॅक्टर म्हणाले.

कोल्हापूरच्या डॉक्टरनी ‘सध्या घेत असलेल्या मी दिलेल्या गोळ्या बंद करणं धोक्याचं ठरेल’ याची कल्पना देऊन आॅपरेशन पुढं ढकलणं मान्य केलं. पण सध्या सुरू असलेली पहिली औषधं बंद करणं धोक्याचं ठरू शकेल असं निक्षून सांगितलं. अर्थात डाॅ. परांजपेनीही त्याला विरोध दर्शवला नाही हे महत्त्वाचं!

या आधी मी ‘ एखादं अतिशय अवघड आणि किचकट गणित चुटकीसरशी

सुटलं जावं तशी पुढची सगळीच सूत्रं वेगानं हलू लागली’ असं म्हटलं होतं त्याची ही सुरुवात होती!

डॉ. परांजपे यांच्या ट्रीटमेंटच्या, त्यांनी लिहून दिलेल्या गोळ्या, रोज सकाळ संध्याकाळ असं दोन वेळा बोटाला करायचा मसाज आणि जखमेला करायचं ड्रेसिंग या तीन महत्त्वाच्या गोष्टी होत्या. मसाज साठी आवश्यक ते तेल डॉक्टर स्वतः तयार करून देणार होते. ते तेल बोटाला हलक्या हाताने मसाज करून पूर्ण मुरवायचे होते. ड्रेसिंग करण्यापूर्वी जास्त प्रमाणात पिकून लिबलिबीत झालेल्या देशी केळ्याचा गर कुस्करून त्याचा लेप जखमेवर व्यवस्थित लावून त्यावर मेडिकेटेड कापसाची घडी ठेवून मग बँडेज करायचे होते.

ट्रीटमेंट नियमित सुरू झाली. योगिताने स्वीकारलेली जबाबदारी अतिशय निगुतीने अगदी मनापासून पार पाडली. पहिले दिड-दोन महिने कांहीही फरक जाणवला नाही तरी तिने धीर सोडला नाही. नंतर मात्र अगदी कणाकणानंच पण बोटावरची सूज कमी होतेय असं मसाज करताना तिला जाणवू लागलं. आणि पुढेही खूप दिवस चिकाटीने हा नित्यक्रम असाच सुरू ठेवल्यानंतर अखेर बोटावरची सूज हळूहळू करत एक दिवस पूर्णतः उतरली. त्याचवेळी हाडांचा भुगा होऊन अतिशय पोकळ झालेलं त्या बोटाचं हाडही भरून येऊ लागलं आणि अखेर ताईचं बोट वाचलं!!

या घटनेला आज दहाबारा वर्षं उलटून गेलीयत. पण ती आठवण मात्र मी कधीच विसरू शकणार नाही. या दरम्यानच्या प्रत्येक राखीपौर्णिमेला आणि भाऊबीजेला जेव्हा ताई मला ओवाळते तेव्हा त्या निरांजनाच्या प्रकाशात माझ्याही नकळत माझी नजर तिच्या हातातल्या ताम्हणाखाली लपलेल्या तिच्या ‘त्या’ बोटाचा वेध घेत असते!!

इथं आयुर्वेदिक ट्रीटमेंटला गुण येणं हा चमत्कार नव्हताच. चमत्कार लपलेला होता तो त्या त्या वेळी घडत गेलेल्या सगळ्या घटनाक्रमांत! त्यातील प्रत्येक वळणावर ‘तो’ होताच. त्या त्या प्रसंगात ‘तो’ स्वतःच घालत असलेली असंख्य धाग्यादोऱ्यांची घट्ट वीण मला इतक्या प्रदीर्घ काळानंतर आजही स्वच्छ जाणवते आणि मी ‘त्या’च्यापुढे मनोमन नतमस्तक होतो!!

क्रमश:…  (प्रत्येक गुरूवारी)

©️ अरविंद लिमये

सांगली (९८२३७३८२८८)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “भीती.. एक मूलभूत प्रेरणा” ☆ श्री जगदीश काबरे ☆

श्री जगदीश काबरे

☆ “भीती.. एक मूलभूत प्रेरणा☆ श्री जगदीश काबरे ☆

भीती ही सजीवांच्या उत्क्रांतीतील अत्यंत मूलभूत आणि संरक्षणात्मक यंत्रणा आहे. चार्ल्स डार्विन यांनी ‘नैसर्गिक निवड’ या सिद्धांतात दाखवून दिले आहे की, ज्या प्राण्यांमध्ये धोक्याच्या जाणीवेनंतर त्वरेने प्रतिक्रिया देण्याची क्षमता होती, तेच अधिक काळ टिकले. भीती ही म्हणूनच कधीकधी नकारात्मक नसून जीवनरक्षक ठरली आहे. जंगलात अचानक साप दिसल्यावर पाय मागे घेणे, आगीपासून दूर पळणे किंवा वेगाने धावणाऱ्या वाहनापासून बाजूला होणे, या सर्व क्रिया भीतीमुळेच घडतात. मेंदूमधील अमिग्डाला हा भाग संभाव्य धोक्याचे संकेत ओळखून शरीरात ‘लढा किंवा पळा’ (fight or flight) अशी प्रतीक्षिप्त प्रतिक्रिया निर्माण करतो. त्यामुळे हृदयाची गती वाढते, स्नायूंमध्ये रक्तपुरवठा वाढतो आणि क्षणार्धात निर्णय घेतला जातो. म्हणून भीती ही कमकुवतपणाची नव्हे, तर सजगतेची खूण आहे.

परंतु माणूस केवळ जैविक प्राणी नाही; तो सामाजिक आणि सांस्कृतिक पर्यावरणात घडत असतो. लहानपणापासून मिळालेले संस्कार, पालकांची वागणूक, शाळेतील अनुभव, समाजातील मूल्यव्यवस्था, या सर्व गोष्टी मिळून भीतीचा स्वभाव ठरवतात. ज्या मुलाला सतत दडपण, शिक्षा, अपमान किंवा चुकलास तर संपलास, अशी भीती दाखवली जाते, त्याच्या मनात असुरक्षिततेची पायाभरणी होते. तो प्रसंगासमोर उभा राहण्याऐवजी मागे हटण्याची सवय लावतो. उलट ज्या मुलाला चुका करण्याची मुभा, प्रश्न विचारण्याचे स्वातंत्र्य आणि प्रयत्नांचे कौतुक मिळते, त्याच्यात आत्मविश्वासाची बीजे रुजतात. त्यामुळे एकाच परिस्थितीत दोन वेगवेगळ्या व्यक्तींच्या प्रतिक्रिया भिन्न असतात—एक घाबरते, दुसरी धैर्याने उभी राहते. पण कधीकधी समाज ‘शूर’ म्हणून ज्या व्यक्तीला ओळखतो, तीही विशिष्ट प्रसंगी घाबरते. कारण धैर्य हा गुण कायमस्वरूपी नसून परिस्थितीनुसार बदलणारे मानसिक स्थित्यंतर असते. एखादा सैनिक रणांगणात निडर असू शकतो, पण कुटुंबीयांच्या आजारपणासमोर असहाय्य वाटू शकतो. एखादा वक्ता मंचावर प्रभावी बोलू शकतो, पण अन्यायाविरुद्ध सार्वजनिक भूमिका घ्यायची वेळ आली की सामाजिक बहिष्काराच्या भीतीने गप्प बसू शकतो. उदाहरणार्थ लोकमान्य टिळकांनी विलायतेतून परत आल्यानंतर हिंदू शास्त्रानुसार प्रायश्चित्त घेतले होते. कारण येथे भीती ही केवळ शारीरिक धोक्याची नसते; ती सामाजिक प्रतिमेची, नातेसंबंधांची, आर्थिक सुरक्षिततेची किंवा सत्तेच्या दबावाची असते. म्हणूनच सत्य आपल्या बाजूला असले तरी त्यासाठी उभे राहण्याचे धैर्य सर्वांकडे असतेच असे नाही. समाजात अनेकदा ‘शूर’ आणि ‘भ्याड’ अशी द्वैती विभागणी केली जाते. पण प्रत्यक्षात धैर्य आणि भीती हे परस्परविरोधी नसून परस्परपूरक आहेत. भीती नसलेला माणूस बेजबाबदार ठरू शकतो; तर भीतीच्या अतिरेकाने माणूस निष्क्रिय होतो. खरे धैर्य म्हणजे भीतीची जाणीव असूनही योग्य कृती करणे होय.

सामाजिक संरचना भीतीला अनेकदा साधन म्हणून वापरते. कुटुंब, धर्म, राजकारण, कार्यालयीन व्यवस्थापन या सर्वच ठिकाणी ‘भीती’ ही नियंत्रणाची पद्धत म्हणून कार्यरत असते. “लोक काय म्हणतील? ”, “नोकरी जाईल”, “देव रागावेल”, “समाजातून बहिष्कृत केले जाईल”, या मानसिकतेपोटी भीतीची संस्कृती रुजवली जाते. भीतीत वाढलेला माणूस प्रश्न विचारणे टाळतो, अन्याय सहन करतो आणि शक्तिशाली व्यक्तींच्या आक्रमणाला बळी पडतो. येथे मानसशास्त्रीय दृष्टीने सामाजिक असहाय्यता दिसते. वारंवार पराभव किंवा दडपशाही अनुभवल्यानंतर माणूस प्रतिकार करण्याची इच्छा गमावतो. याच्या उलट, भीतीवर मात करणारी व्यक्ती यशस्वी होण्याची शक्यता अधिक असते, कारण ती कृतीशील असते. काही व्यक्तींच्या बाबतीत भीती पूर्णपणे नाहीशी होत नाही; परंतु ती स्वीकारूनही पुढे जाण्याची क्षमता विकसित केली जाते. मानसशास्त्र सांगते की, धैर्य म्हणजे भीतीचा अभाव नव्हे, तर भीती असूनही योग्य कृती करणे. जेव्हा व्यक्ती स्वतःच्या मूल्यांशी प्रामाणिक राहते, तेव्हा बाह्य दबावांची तीव्रता कमी होते. सामाजिक परिवर्तनाच्या इतिहासात अशी अनेक उदाहरणे आढळतात की, भीतीवर मात केलेल्या व्यक्तींनीच अन्यायाला आव्हान दिले आणि समाजात बदल घडवले. जसे महात्मा गांधी न्यायालयासमोर सत्य सांगण्यास कधीही कचरले नाहीत आणि मिळेल ती शिक्षा आनंदाने भोगली. याचा अर्थ त्यांच्याकडे अलौकिक शक्ती होती असे नव्हे तर त्यांच्याकडे होते ते आत्मभान, तर्कशक्ती आणि परिणामांची जाणीव असतानाही उभे राहण्याचे साहस.

मानसिकदृष्ट्या भीतीवर मात करण्यासाठी काही घटक महत्त्वाचे ठरतात. पहिला घटक म्हणजे आत्मजागरूकता. ही आपल्याला नेमकी कशाची भीती वाटते हे ओळखायला शिकवते. दुसरा, अनुभवांची पुनर्रचना करणे. म्हणजे असे की, एखादा प्रसंग अपयशाचा नसून शिकण्याची संधी आहे, असा दृष्टिकोन स्वीकारणे. तिसरा, सामाजिक पाठबळ मिळणे. मित्र, कुटुंब किंवा सहकारी यांचे समर्थन व्यक्तीला स्थैर्य देते. चौथा, मूल्याधिष्ठित जीवनदृष्टी तयार होणे. स्वतःच्या तत्त्वांवर उभे राहण्याची तयारी. या प्रक्रियेत व्यक्ती हळूहळू भीतीला शत्रू न मानता मार्गदर्शक म्हणून पाहू लागते.

थोडक्यात, भीती ही मानवी स्वभावाची अपरिहार्य आणि नैसर्गिक प्रेरणा आहे. ती आपल्याला धोक्याची जाणीव करून देते, पण तिच्या अधीन राहणे किंवा तिला नियंत्रित करणे हे आपल्या सामाजिक संस्कारांवर, मानसिक प्रशिक्षणावर आणि मूल्यव्यवस्थेवर अवलंबून असते. जो माणूस भीतीच्या छायेतून बाहेर पडून परिस्थितीला सामोरे जातो, तो केवळ वैयक्तिक यशाकडेच वाटचाल करत नाही, तर सामाजिक परिवर्तनाचाही वाहक ठरतो.

© श्री जगदीश काबरे

(लेखक विज्ञान आणि वैज्ञानिक दृष्टीकोन प्रसारक आहेत.)

jetjagdish@gmail. com

मो ९९२०१९७६८०

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ – अंतः अस्ति प्रारंभः… – ☆ अलका ओमप्रकाश माळी ☆

अलका ओमप्रकाश माळी

?  विविधा ?

☆ – अंतः अस्ति प्रारंभः… – ☆ अलका ओमप्रकाश माळी ☆

“शेवट हीच सुरुवात आहे” किती गहन विचार आहे जो जीवनातील प्रत्येक समाप्तीतून नवीन संधी, शिकवण आणि बदलाची नवी दिशा कशी मिळते हे सांगत असतो ज्यात संकट, पराभव, अपयश किंवा एखादी गोष्ट संपल्यावर नवीन प्रवास सुरू होतो, हा विचार जीवनचक्राचे चक्र आणि सकारात्मक दृष्टिकोन दर्शवतो.. निसर्गातील अशा कित्येक उदाहरणांमधून अंतः अस्ती प्रारंभः ह्याच दर्शन घडत असत.. एखाद वठलेलं झाड, पान गळतीने निष्पर्ण झालेला बगीचा मनात उदासीनतेचे भाव आणत असतो तोच बगीचा चैत्र पालवीने सोनेरी रंगात जेंव्हा बहरून फुलतो तेंव्हा मनाला सुखावत असतो.. इथे पान गळती हा शेवट आणि चैत्र पालवी ही सुरुवात असते पुन्हा नव चैतन्य फुलविण्याची.. एखाद अपयश एखाद संकट आपल्याला दुःखी करत संपल आता सगळं अस वाटत असताना एक नवी संधी चालून येते एक नवा मार्ग सापडतो तेंव्हा अपयशाकडे पाहण्याचा ही दृष्टिकोन बदलतो.. आपण नेहमी आपल्यासाठी योग्य तेच निवडतो आहोत अस वाटत असत आपल्याला पण त्या विधात्याचे खेळ काही निराळे असतात आपल्यासाठी आपण निवडलेल्या पर्याय शिवाय त्याचे पर्याय जास्त योग्य असतात.. तो जेंव्हा एखाद संकट देतो तेंव्हाच त्याचा शेवट ही त्याने ठरविलेला असतोच.. पण आपला नकारात्मक दृष्टिकोन मात्र आपल्याला दुःखी करत असतो.. जर शेवट ठरलेला आहे तर नवी सुरुवात ही निश्चित असते पण त्यासाठी गरजेचा असतो तो संयम आणि सकारात्मक दृष्टिकोन.. पण आपण नेहमी उलटाच विचार करत असतो हे अस माझ्याच बाबतीत का होत नेहमी वाईटच होत हा दृष्टिकोन आपल्या प्रगतीतील मोठा अडथळा ठरतो.. कोणतीच गोष्ट चिरकालीन नसते प्रत्येकाचा शेवट हा ठरलेलाच असतो आणि जिथे शेवट असतो तिथे नवी सुरुवात ही असतेच.. हा विश्वास मात्र आपल्या मनाशी पक्का हवा.. एखादी गोष्ट जर अचानक बदलत असेल नव वळण घेत असेल तर येणाऱ्या प्रत्येक वळणावर एक नवी दिशा एक नवी संधी किंवा एक नवी सुरुवात असतेच हा सकारात्मक दृष्टिकोन मनात असेल तर कोणताच पराभव संकट किंवा आयुष्यात येणारे अवघड वळण ही सोप्पे होते.. आयुष्याच्या प्रवासात अनेक अशी वळणं येतात जिथे आपण मानसिक रित्या पूर्णपणे कोसळून जातो.. कुठे जिवलग नात्यांचा शेवट असतो कुठे समाजाने दिलेले धोके असतात कुठे आलेली अनेक संकटे आव्हाने असतात तर कुठे सतत होणारा पराभव असतो अशावेळी स्वाभाविकच आपण कोलमडतो, दुःखी होतो पण अशा वेळी हा शेवट सकारात्मकतेने स्वीकारून त्यातून येणाऱ्या नव्या संधी कडे वाटचाल करत ध्येय ठरवाव लागत आणि हे जेंव्हा आपण स्वीकारतो तेंव्हा तिथे आयुष्याला एक नवी कलाटणी मिळते एक नवी सुरुवात आपली वाट बघत असते.. गरज असते ती आपल्या संयमाची आणि चिकाटीने चालत राहण्याची.. जिथे एक गोष्ट संपते, तिथूनच दुसऱ्याची सुरुवात होते.

हा विचार जीवनातील बदल आणि निरंतरतेचे प्रतीक आहे, प्रत्येक शेवट नवीन संधींना जन्म देतो. अपयश किंवा संकट हे नवीन कौशल्ये शिकण्याची आणि अनुभवांची संधी असते. हा विचार खचलेल्या व्यक्तीला नवी उभारी देतो आणि जीवनाकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहण्यास शिकवतो.

‘अंतः अस्ति प्रारंभः’ हे जीवनाचे सार आहे. हे तत्त्व आपल्याला अपयशातून शिकायला, नवीन मार्ग शोधायला आणि आव्हानांना संधी म्हणून बघायला शिकवते. त्यामुळे, आयुष्यात जेव्हा गोष्टी संपल्यासारखे वाटतात, तेव्हा निराश न होता नवीन प्रवासाची तयारी करणे महत्त्वाचे आहे.

थोडक्यात, ‘अंतः अस्ति प्रारंभः’ हा जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे. हा विचार आपल्याला प्रत्येक शेवटाकडे एका नव्या सुरुवातीच्या आशेने पाहण्यास शिकवतो, ज्यामुळे जीवन अधिक अर्थपूर्ण आणि सकारात्मक बनते.

© अलका ओमप्रकाश माळी

मोब. 8149121976

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “एच. टी. डी. ओ. – ई स्टिकर…” ☆ सुश्री संध्या बेडेकर ☆

सुश्री संध्या बेडेकर

? विविधा ?

☆ “एच. टी. डी. ओ. – ई स्टिकर…” ☆ सुश्री संध्या बेडेकर ☆

“HTDO –Hold The Door Open. “

‘E’ Sticker

‘E’ stands for ‘Elders’

हे स्टीकर ‘ Senior citizens ‘ ने आपल्या कार वर लावायचे. याचा अर्थ असा की, ही कार एक जेष्ठ काका चालवित आहेत. असा होतो.

अक्षय कुमार व राहुल द्रविड ची जाहिरात बघीतली.

मला खूप आवडली ही जाहिरात.

कारण समोरची कार कोण चालवतय ?? हे मागे येणाऱ्या वाहनात बसलेल्या वाहकला कळत नाही. दिसत नाही. समोरचे वाहन हळूहळू चालत असेल, तर मागच्या वाहनाला खूप त्रास होतो. आणि त्यात जर एखादा तरूण मुलगा बसला असेल तर त्याला तर ही ‘स्लो स्पीड ‘असह्य होते. त्याचे ‘patience’ च संपतात.

प्रत्त्येक गोष्ट ‘हाय स्पीड ‘ने करणारा हा तरुण वर्ग. यांच्या करिता कोणतिही गोष्ट हळूहळू करणे म्हणजे एक प्रकारची शिक्षाच असते.

मग ते हॉर्न वाजवून समोरच्या ड्रायव्हरला दम भरतात. त्याचे ब्लड प्रेशर वाढवतात.

समोरच्या कार मधील जेष्ठ नागरिक स्वतः ला सांभाळत, आपले दुखणारे पायाने ब्रेक दाबत कार चालवायची हिम्मत करतो.

“आता ‘reflexes’ हळू झाले आहेत. गर्दी बघीतली की जीव घाबरतो. दृष्टी अधू झाली आहे. कार पार्क करणे हे तर सध्या खूप मोठे संकटच आहे. “असं सर्व आपल्या मनाशी बोलतच असतो.

तरी तो हिम्मत करून मोठया आत्मविश्वासाने कार काढतो. ” आता मी रात्री तर ड्रायव्हिंग करणे सोडलेच आहे. डोळ्यावर प्रकाश डायरेक्ट पडला की त्रास होतो. ” हे तो जाणून आहे. आजही दिवसा ढवळ्या कार चालवायची हिम्मत आहे त्यांची. एक तर घरी कार आहे, तर तिला मधून मधून चालविणे पण गरजेचे आहे. नुसती उभी ठेवली तर खराब होईल. तिचा वर्षभराचा खर्च ही आहेच. आजींना बाहेर न्यायचे म्हणजे, कारने जाणे सोयीस्कर आहे. कारण स्कूटर वर बसणे आता आजींना जमत नाही. भीती वाटते. तेंव्हा या सर्व गोष्टींचा विचार करून जेष्ठ कार चालवतात.

आता ते, हे ‘E ‘ sticker आपल्या कारच्या मागे पूढे लावतील, तर मागून येणाऱ्या कारला हे कळेल, की समोरची कार कोणी तरी जेष्ठ काका चालवित आहे. म्हणून स्पीड कमी आहे. हे समजून तो हॉर्न वाजवणार नाही. व पूढे जायचा दुसरा मार्ग शोधेल.

खरंय, म्हातारपण आयुष्यातील एक वेगळीच फेज आहे. खूप जास्त किंवा खूप कमी आत्मविश्वास दोन्ही उपयोगाचे नाही. वयामानाप्रमाणे अगदी लहान सहान गोष्टींचा ही त्रास होतो. चिडचिड होते. लगेच उत्साह मावळतो. पेशन्स कमी होतात. त्यामुळे खूप मोठा आवाज, सारखा हॉर्न ऐकुन त्रास होतो. गोंधळायला होत. बी पी वाढत.

आता हे समजणे पण गरजेचे आहे की रस्ता तर सर्वांसाठीच आहे. आणि यंग मुलं आपल्या वयाप्रमाणेच वागतील. ते त्यांचे ‘natural ‘वागणे आहे. त्यांच्या करिता ऑफिसला जाणे. इतर कामे वेळेवर करणे गरजेचे आहे. त्यामुळे त्यांची पण चूक नाही.

फक्त एकच गोष्ट होण्यासारखी आहे. ती म्हणजे दोघांनी एकमेकांची सोय बघावी. मान द्यावा. व समजदारी दाखवावी. “दादागिरी करण्यापेक्षा समजदारी केंव्हा ही चांगली”.

प्रत्त्येक परिस्थितीतून निघायचा एक मधला मार्ग असतोच. जसे “उकळत्या पाण्यात आपले प्रतिबिंब दिसत नाही. पण तेच शांत पाण्यात व्यवस्थित दिसत. त्याचप्रमाणे शांत डोक्याने विचार केला तर मार्ग मिळतोच”.

आजचे तरूण उद्या जेष्ठ होणारच आहेत ना.

या सर्व गोष्टी सवयीचा भाग आहे. मानसिक, वैचारिक सवयी लावायच्या असतात.  समाजात काही चालीरीती रुजवायच्या असतात.

नवयुवकांनी थोड़े लक्ष दिले, जेष्ठांना मदतीचा हाथ दिला, तर दोघांना आनंद होईल. आपण खूप दा स्वतः चाच विचार करून छोट्या छोट्या गोष्टींचा आनंद घेतो स्वतः ला ‘ जिंकलो ‘ असं समजतो. आनंदी होतो.

कधी कधी कार पार्क करताना, एका जागेवर दोन गाड्या पोचतात. एक तरूण मुलगा सवयीप्रमाणे पटकन त्या जागेत आपली कार पार्क करतो. व दुसऱ्या कार मधील जेष्ठ राहुन जातो.

कधी आपली जागा दुसऱ्याला देऊन तर बघावे. दरवाजा उघडून स्वतः आत जाऊन खाडकन दरवाजा बंद करण्या ऐवजी, दरवाजा उघडून दुसऱ्याला आधी आत जाऊ द्या. असे करून तर बघा. माझ्या साठी कोणीतरी दरवाजा उघडला आहे ही आनंदाची गोष्ट आहे.

स्वतः च्या आधी, थोडा दुसऱ्याचा विचार करून तर बघा, चांगले वाटेल.

आपल्या करिता आपण करतोच. थोडं स्वतः ला मागे ठेवून दुसऱ्या करिता केले तर, त्यात नुकसान कमी, आनंद जास्त मिळेल. दुसऱ्या ला महत्व देऊन तर बघा. जर तो दुसरा कोणी जेष्ठ असेल तर आनंद व आशिर्वाद दोन्ही मिळेल.

रस्त्यावर जेष्ठ सूखरूप राहतील. असे वागून तर बघा. सर्वांच्याच समस्या दूर होतील.

थोडा वेगळा विचार करायची गरज आहे. दुसऱ्या करिता आनंदाने जागा द्यायला, दुसऱ्यांकरिता दरवाजा उघडायला शिका.

Give a thought on life changing lesson—‘ HTDO ‘– “Hold The Door Open. “

“क्यों न थोड़ा-सा अलग बने, खुश रहने की वजह बने । “

 म्हणतात ना,

” It is nice to be important. but it is more important to be nice. “

© सुश्री संध्या बेडेकर 

पुणे

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ मारिया मॉन्टेसरी ☆ शालिनी जोशी ☆

शालिनी जोशी

? विविधा ?

☆ मारिया मॉन्टेसरी ☆ शालिनी जोशी

मारिया मॉन्टेसरी

 मॉन्टेसरी म्हटलं की आपल्यासमोर येते पहिलीच्या आधीची शाळा. हे एका व्यक्तीचे, स्त्रीचे आडनाव आहे हे सहसा कुणाला माहीत नसतं. मारिया मॉन्टेसरी इटलीतील ॲलेस्सॅड्रो आणि रेनिल्देला या दाम्पत्याची मुलगी होती. जन्म ३१ ऑगस्ट १८७०. वडील सरकारी नोकरीत आणि आई घरकाम करणारी. असे हे सुखी मध्यमवर्गीय कुटुंब होते. त्या काळात स्त्री शिक्षणाला स्थान नव्हतं. तरीही मारियाला नवीन काही शिकवावं अशी इच्छा तिच्या आईची होती. मुलींच्या शिक्षणात शिवणकाम, विणकाम यावर भर असे. तेथे बुद्धिमत्तेला वाव नव्हता. मुला मुलींच्या शाळा वेगवेगळ्या असत. शिक्षक सांगतील ते ऐकायचं आणि पाठ करायचं. ही घोकंपट्टी मारियाला कंटाळवाणी वाटे. तिला सुरुवातीला गणितात गती होती. पण मुलींसाठी ते अनावश्यक अशी समाजाची समजूत होती. तरीही शेवटी आईच्या प्रोत्साहनाने ती वैद्यकशास्त्राकडे वळली.

 उभ्या इटलीत कोण्या स्त्रीने या शास्त्राचा विचार केला नव्हता. वडिलांनाही पसंत नव्हतं. पण त्यानी विरोध केला नाही. अनेक जाचक चालीरीती सांभाळून मारियाने शिक्षणात प्रगती केली. उदाहरणार्थ वर्गातील सर्व मुलांनी आपापल्या जागेवर बसल्याशिवाय मारियाला वर्गात प्रवेश नव्हता. कारण पुरुषांना ओलांडून जाणं शिष्ट संमत नव्हतं. खोडसाळ मुलानी बसायला जागाच ठेवली नाही तर दोन तीन तास सुद्धा उभे राहावे लागे. पण मारीयाने जिद्द सोडली नाही. बालकांचा विशेष अभ्यास केला. तिच्या शेवटच्या वर्षीच्या भाषणाने सर्व भारावून गेले. मानसशास्त्राचा संशोधनात्मक प्रबंध सर्वमान्य झाला. तिला डॉक्टर पदवी बहाल करण्यात आली. इटलीतील पहिली महिला डॉक्टर ती ठरली. पुरुषांच्या साठी असलेल्या पदवी सर्टिफिकेट मध्ये खाडाखोड करून तिच्यासाठी सर्टिफिकेट तयार करावे लागले.

 मारिया देखण्या होत्या. काळेभोर गनदाट केस, नीटनेटका पोशाख, वागण्यात मार्दव, आकर्षक व्यक्तिमत्व, बुद्धिमत्ता आणि धाडसी स्वभाव यामुळे मारिया रस्त्याने निघाली की लोकांच्या नजरा तिच्यावर खिळत. समाजाने तिला डॉक्टर म्हणून मान्यता दिली. स्त्रियांच्या हक्काविषयी त्यांची भाषणे उत्स्फूर्त असत. त्यामुळे वृत्तपत्रांचा कुतुहुलाचा विषय झाली. बालरोग तज्ञ म्हणून कीर्ती वाढू लागली.

 मनोरुग्ण बालकांचे विशेष निरीक्षण त्यांनी केले. तेव्हा लक्षात आलं ही मुलं जेवण झाल्यावर जमिनीवर पडलेले अन्नकण शोधून खातात. यात त्यांचा खाणे हा हेतु नसून हाताने काही कृती करावी वाटते. ती मूर्ख नाहीत तर बुद्धीचा वापर करायची संधी त्यांना मिळत नव्हती. याशिवाय जंगलातील मुलगा, मुक व कर्णबधीर मुले, अविकसित मुले यावर त्यांनी विशेष अभ्यास केला. अशा मुलांसाठी वेगळी शिक्षण व्यवस्था असावी. नाहीतर ते गुन्हेगारी प्रवृत्तीच्या आहारी जातील. येथे शिक्षेचा उपयोग नाही. डॉक्टर आणि प्रशिक्षित शिक्षक हवेत. हा विचार लोकांना पटला. बालरोगतज्ञ, मानसशास्त्रज्ञ, मानवंशशास्त्र अभ्यासक, शिक्षणशास्त्र अभ्यासक अशी महिला डॉक्टर अशी त्यांची ओळख निर्माण झाली.

 स्त्रियांविषयी त्यांची मते स्पष्ट होती. स्त्रियांना दुय्यम ठरविण्याला त्यांचा विरोध होता. विवाह आणि मातृत्व स्त्रियांवरती लादू नये. ते त्यांनी स्वेच्छेने स्विकारावे. अतिरिक्त कामामुळे बायका अशक्त व कमकुवत होतात. त्यामुळे तशीच मुले जन्माला येतात. नव स्त्री ही शुद्ध सामाजिक पर्यावरण निर्माण करेल. तिथे युद्ध नसतील. गुन्हेगारी नसेल. न्यायव्यवस्थेची गरज पडणार नाही. असे त्या आर्जवून सांगत. दु:खाला तोंड देण्यासाठी धर्मादाय काम, अशी समाजाची धारणा बदलून दुःख निर्माण होणार नाही यासाठी विज्ञानाच्या साह्याने प्रतिबंधात्मक प्रयत्न व्हावे. रोग आजार दुरुस्त करण्यापेक्षा निर्माण होणार नाहीत असे प्रयत्न असावे. त्यामुळे समस्या निवारार्थ होणारा पैशाचा भार कमी होईल. असे त्यांचे ठाम मत होते. अशा प्रकारे स्त्रीवादी म्हणून इटलीत त्या ओळखल्या जाऊ लागल्या.

 अक्षम, मतिमंद मुलेही योग्य शिक्षणाने सर्वसामान्य मुलांच्या शाळेत जाऊ शकतात. हे त्यांनी सिद्ध करून दाखवले. त्यासाठी योग्य शैक्षणिक साधने आणि मुलांच्या पातळीवर येऊन मुलांत दडलेल्या माणसाला शोधणारे शिक्षक हवेत. शिक्षक हा मार्गदर्शक असावा. साधने कशी वापरावी याचे स्वातंत्र्य मुलांना असावे. यासाठी निरनिराळ्या आकाराचे, रंगाचे ठोकळे व अक्षरे हवीत. कृतिशील शिक्षणावर त्यांनी भर दिला. मुलांच्या वर्तनाला, शिस्त व स्वच्छतेला त्यांनी महत्त्व दिले. शारीरिक व्यायामासाठी साधने तयार केली. गैरवर्तनाला शिक्षा म्हणजे गप्प बसायला लावणे. बेघर, झोपडपट्टीतील रोगराईग्रस्त कुपोषित मुलांसाठीही अशा शाळांचा चांगला परिणाम दिसून आला. पुढे हीच पद्धत सामान्य मुलांसाठी उपयोगात आली. सर्व साहित्याने युक्त शाळा आणि शिक्षकाची केवळ निरीक्षकाची भूमिका, अशीही स्वयंशिक्षण पद्धत क्रांतिकारी ठरली. खेळण्याच्या मुक्त आनंदातून प्रशिक्षण अशी ही डॉक्टर मॉन्टेसरी शिक्षण पद्धती एक चळवळ झाली. इंग्लंड, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, अर्जेंटिना, चीन, रशिया येथेही अशा शाळा निघाल्या. डॉक्टर मारियाने वैद्यकीय व्यवसाय बंद केला. सर्व देशात भेटी व व्याख्याने होऊ लागली. ‘मॉन्टेसरी मेथड’ नावाचे पुस्तक निघाले. प्रशिक्षण वर्ग व त्यातून मॉन्टेसरी महाविद्यालयही इटलीत निघालं.

 भारतातही ॲनी बेझंट यांनी १९१४ मध्ये पहिली मॉन्टेसरी शाळा काढली. रवींद्रनाथ टागोर व डॉक्टर मारिया यांचा पत्र व्यवहार असे. महात्मा गांधींनी इंग्लंडला त्यांची भेट घेतली होती. गिजूभाई बघेका नावाचे वकील होते. त्यांनाही पद्धत जीवन दृष्टी वाटली. त्यांनी ताराबाई मोडक यांच्या मदतीने ही पद्धत गुजराथ, सौराष्ट्र मुंबई येथे वाढवली. त्यांच्या निमंत्रणाने डॉक्टर मारिया भारतात आल्या. येथे त्या सात वर्षे राहिल्या. सर्व देशात मान्यता मिळत असूनही त्यांचे पाय जमिनीवर होते. १९४६ मध्ये त्या परत भारतात आल्या. ताराबाई मोडक यांनी बालशिक्षण नगर भरवले. त्या परिषदेच्या उद्घाटनासाठी त्या आल्या होत्या. कमलाबाई काकोडकर, अनुताई वाघ यांनी या पद्धतीचा अवलंब केला. अजूनही ही पद्धत सुरू आहे. काळानुसार नवीन बदल झाले असतील.

 अशा प्रकारे इटलीची मारिया कार्याच्या वैश्विकतेमुळे सर्व जगाची झाली. अशा या स्त्री शक्तीला सलाम! १९५२ मध्ये वयाच्या ८१ व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. पण मॉन्टेसरी रूपाने अमर झाल्या.

©  शालिनी जोशी

संपर्क – फ्लेट न .3 .राधाप्रिया  टेरेसेस, समर्थपथ, प्रतिज्ञा मंगल कार्यालयाजवळ, कर्वेनगर, पुणे, 411052.

मोबाईल नं.—9850909383

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ मला समजलेली संत तुकारामांची गाथा… भाग – १६ ☆ सुश्री अरुणा मुल्हेरकर ☆

सुश्री अरुणा मुल्हेरकर

? विविधा ?

☆ मला समजलेली संत तुकारामांची गाथा… भाग – १६ ☆ सुश्री अरुणा मुल्हेरकर ☆

 परमेश्वराशी संवाद

गाथेतील अभंगांचे वाचन करीत असताना पटकन लक्षात येणारी गोष्ट म्हणजे तुकाराम महाराज परमेश्वराशी अनेक वेळा अत्यंत जवळीकतेने आणि प्रेमादराने संवाद साधतात. आज आपण त्यांच्या अभंगांतून देवाशी घडलेला संवाद पाहूया.

अखंड नामस्मरण त्यांनी अंगीकारले आहेच. ते हरीला पुन्हा पुन्हा हेच सांगतात की

 हरी तुझे नाम गाईन अखंड/

 यावेळी पाखंड नेणे काही//

 अंतरी विश्वास अखंड नामाचा/

 काया मने वाचा हेची देही//

 तुका म्हणे आता देई संत संग/

 तुझे नामी रंग भरो मना//

हे देवा, माझ्या मुखात तुझेच नाव अखंड रहावे या व्यतिरिक्त मी दुसरी कोणतीच गोष्ट जाणत नाही. तुझ्या नामावरचा माझा विश्वास कायम रहावा, आणि काया, वाचा, मने करून माझ्या ओठी तुझ्या नावाशिवाय दुसरे काहीच नको. ईश्वरा जवळ ते संतांच्या संगतीची याचना करतात कारण संत हे ईश्वराचे रूप आहे.

प्रपंचात अडकलेल्या तुकाराम महाराजांची अवस्था दोलायमान झालेली आहे. ना धड प्रपंच ना परमार्थ अशा स्थितीत ते हरीलाच साद घालतात. त्याला सांगतात, हे मुरारी, माझे चित्त धनामध्ये गुंतले आहे, आणि ते मला दारोदार हिंडवीत आहे. हे मनाचे असे भरकटणे थांबतच नाही. पृथ्वीवर भटकू- नही समाधान काही मिळत नाही.

 धना गुंतले चित्त माझे मुरारी/

 मन घेऊन हिंडवी दारोदारी//

 मन हिंडता न पुरे यासी काही/

 ७मही ठेंगणी परि ते तृप्त नाही//

पुढे ते देवाला सांगतात की त्यांची बुद्धी सुद्धा शांत दिसत नाही, कारण इंद्रिय विषयांच्या भोवऱ्यात ते सापडले आहेत. या अशा भरकटलेल्या चित्तामुळे माझ्या जिवाला शांती नाही. तेव्हा या दुष्ट आणि खोड्याळ मनापासून हे परमेश्वरा तू मला वेगळे कर.

 पाहता न दिसे मज शुद्ध मती/

 पुढे पडीलो इंद्रिया थोर घाती//

 जीवा नास त्या संगती दंडबेडी/

 हरी शीघ्र या दृष्ट संघाशी तोडी//

षड्रिपुंची तुकाराम महाराजांना फार भीती वाटते. ते देवाला विनवतात,

 मोह पापिणी दुष्ट माया ममता/

 काम क्रोध ही यातना थोर करी//

 तुजवाचुनी सोडवी कोण हरी//

ही सर्व माया, ममता, मोह म्हणजे एखाद्या दुष्ट पापिणीसारखे आहेत. काम, क्रोध यामुळे मनाला फार यातना सहन कराव्या लागतात, त्यामुळे हे हरी तुझ्यापासून मी दूर जातो. ते पुढे देवाला सांगतात, निद्रा, दंभ, आळस, याची त्यांना भीती वाटते. म्हणून देवा या दुर्गुणांना माझ्या देहात थारा नसावा. मला फक्त तुझ्या एकट्याचीच हाव आहे.

 निज देखता निज हे दुरी जाये/

 निजा आळस दंभ या भीत आहे//

 तया वस्ती नको देऊ देवा/

 तुज वाचुनी नास्ती आणिक देवा//

 

 करी घातपात भय लाज थोरी/

 असे सत्य व्हाव बहु भक्ती दूरी//

 नको मोकलू दीनबंधू अनाथा/

 तुका विनवी ठेवूनी पायी माथा//

या ठिकाणी महाराजांनी देवाला दीनबंधू म्हणून संबोधले आहे. मोठ्या भावाप्रमाणे हा हरी दीनांचे, पीडितांचे रक्षण करतो. महाराजांच्या काळातही घातपात लबाडी होतीच. तर त्यापासून ते म्हणतात हे दीनबंधू तू मज अनाथाला वाचव. संशय, संकोची वृत्ती हे अवगुण फार घातक आहेत तेव्हा मला तू यापासून दूर ठेव. तुझ्या पायांवर माझी एवढी विनंती आहे.

प्रपंचातील तुकाराम महाराज स्वतःला अनाथ म्हणत आहेत, कारण एका परमेश्वराशिवाय त्यांना आजूबाजूला दुसरे कोणी दिसतच नाही.

पांडुरंगाच्या दर्शनाची उत्कट आस हा तर गाथेचा गाभा आहे. पांडुरंगाला ते माऊलीच म्हणतात. याही अभंगात त्यांची ही माऊलीच्या भेटीची उत्कटता दिसून येते. आईची आणि तिच्या अपत्याची काही कारणांमुळे ताटातूट झाली तर ते बालक सैरभैर होऊन मोठ्याने रडायला लागते, तशीच तुकाराम बुवांची अवस्था या त्यांच्या अभंगातून झालेली आपल्याला दिसते.

 बोलोनिया दाऊ का तुम्ही नेणाजी देवा/

 ठेवाल ते ठेवा ठाई तैसा राहीन//

 पांगुळले मन काही नाठवे उपाय/

 म्हणून पाय जीवी धरुनी राहिलो//

 त्याग भोग दुःख काय सांगावे मांडावे/

 ऐसी धरियेली जीवे माझ्या थोर आशन का//

 तुका म्हणे माता बाळ चुकलीया वनी/

 न पवता जननी दुःख पावे विठ्ठले//

महाराज म्हणतात, ” हे देवा मला दर्शन द्या असे तुम्हाला वारंवार सांगण्याची आवश्यकता आहे का? तुम्हाला तर हे माहीतच आहे. तुम्ही मला जसे ठेवाल तसा मी राहीन. माझं मन अत्यंत दुर्बल झाल्यामुळे मी तुमच्या पायाशी आलो आहे, माझ्याकडे अन्य कोणताच उपाय नाही. मी कोणते भोग घ्यावे, कोणते दुःख सोसावे मला माहित नाही. रानामध्ये आई आणि मुलाची ताटातूट झाल्यासारखी माझी मनस्थिती झाली आहे.

विठ्ठलाच्या दारात जणू काही धरणे धरून बसल्यावर तुकाराम महाराजांना स्वतःतीलच दोष दिसतात आणि मग ते रागाने विठ्ठलाला म्हणतात,

 जळो माझे कर्म वाया केली कटकट/

 झाले तसे तंट नाही आले अनुभवा//

मी उगीचच तुमच्या दारात कटकट केली आग लागो माझ्या कर्माला. तुमची सत्कीर्ती मी जी ऐकली त्याचा मला अनुभव आला नाही.

 आता पुढे धीर काय देऊ या मना/

 ऐसे नारायणा प्रेरिले ते पाहिजे//

अहो नारायणा आता मी माझ्या मनाला कसा धीर देऊ ते तुम्हीच सांगा.

 गुणवंत केलो दोष जाणयासाठी/

 माझे माझे पोटी बळकट दूषण//

मला तुम्ही गुणवंत केलेत, पण मी परदोषच बघत बसलो. मी व माझे मानणे हा तर माझ्यातीलच दोष आहे.

 तुका म्हणे अहो केशीराजा दयाळा/

 बरवा हा लळा पाळीयेला शेवटी//

शेवटी महाराज म्हणतात, ” हे केशवा, दयाळा, तुम्ही माझे खूप लाड पुरवलेत, त्याची प्रचिती आली. माझे गुणदोष समजले, हे तुमचे माझ्यावर चांगले उपकार झाले. याचाच अर्थ जेव्हा महाराजांनी स्वतःच्या अंतरंगात डोकावून पाहिले तेव्हा त्यांना हे ज्ञान मिळाले.

असे देवाशी कधी भांडण, कधी रुसवा कधी गोडवा दर्शविणारे अनेक अभंग गाथेत सापडतात आणि त्यावरून तुकाराम आपल्याला समजतातच परंतु परमार्थाचीही. आपल्या सामान्यांना थोडी तरी ओळख होते.

पुढील भागात आणखी काही अभंगांचा आपण विचार करू.

क्रमशः… १६

© सुश्री अरुणा मुल्हेरकर 

डेट्राॅईट (मिशिगन) यू.एस्.ए.

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares