मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ शब्दयात्री (ललित लेख संग्रह) – लेखिका :  सुश्री जयश्री जयशंकर दानवे ☆ परिचय – सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ शब्दयात्री (ललित लेख संग्रह) – लेखिका :  सुश्री जयश्री जयशंकर दानवे ☆ परिचय – सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

पुस्तक परिचय

पुस्तक : शब्दयात्री (ललित लेख संग्रह)

लेखिका : जयश्री जयशंकर दानवे 

प्रकाशक : अथर्व प्रकाशन 

प्रथम आवृत्ती : मार्च 2025 

नामवंत कवी आणि गीतकार यांची माहिती देणारे अतिशय सुंदर पुस्तक!

अनुक्रमणिका वाचतानाच भा. रा. तांबे, बालकवी ठोंबरे, कवी अनिल, बा.भ. बोरकर, कुसुमाग्रज, वा.रा.कांत, इंदिरा संत, विंदा ,अशी नामावली वाचत गेले आणि खूप छान काही वाचायला मिळणार अशी खात्रीच झाली!

प्रत्येक कवी कवयित्रींच्या काव्याबरोबरच त्यांची इतरही माहिती या पुस्तकात वाचायला मिळते काव्य कसे सुचलं, केव्हा सुचलं ह्या गोष्टी सुद्धा त्यामध्ये दिल्या आहेत.

अनुक्रमणिकेच्या पुढील भागात शांता शेळके, पाडगावकर, सुरेश भट, आरती प्रभू, कवी ग्रेस, जगदीश खेबुडकर ,शांताराम नांदगावकर ,कवी ग्रेस,सुधीर मोघे, ना.धो. महानोर अशा कवीं बद्दल आणि त्यांच्या गीतांबद्दल वाचायला मिळणे म्हणजे एक मेजवानीच आहे .या पुस्तकात अशी २० व्यक्तिचित्रणे वर्णन केली आहेत. आपल्या काव्य- कवितांच्या साम्राज्यातील हे सर्व माणिक मोतीच आहेत!

‘जन पळभर म्हणतील हाय हाय..’ हे अतिशय भावपूर्ण गीत तर गदिमांचे ‘पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा’ हे गीत कसे जन्माला आले याचे लेखिकेने वर्णन केले आहे. शांता शेळके यांचे ‘ऋतू हिरवा, कवी ग्रेस यांचे ‘भय इथले संपत नाही,’ जगदीश खेबुडकर यांचे ‘देहाची तिजोरी’ सर्वच गाणी मनाला भुलवणारी आणि गेय आवडणारी अर्थपूर्ण अशी गाणी!

गाण्यांचे अर्थ खूपच छान उलगडून दाखवले आहेत. ज्यांना काव्याची आवड आहे त्यांना अगदी भुरळ घालणारे असे हे पुस्तक आहे. जयश्रीताई दानवे यांनी लिहिलेली ही कवींच्या काव्याबद्दलची परीक्षणे अतिशय सुंदर आहेत!

पुस्तकातील भाषा अर्थ प्रवाही भावप्रवाही अशी आहे त्यात वापरलेले शब्द तरल भाव दाखवणारे असे आहेत. कवीच्या, लेखकाच्या मनातील अभिप्रेत अर्थ त्याच्या कवितेत उतरतो तेव्हा तो लेखक किंवा कवी शब्द- यात्रीच असतो!

असे हे पुस्तक वाचणे सर्वांनी जरूर वाचावे असे मला वाटते. 

परिचय – सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

वारजे, पुणे.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ असा हा राजहंस – लेखक : श्री व्यंकटेश श्रीपाद राजहंस  ☆ परिचय : सुश्री त्रिशला शहा ☆

सुश्री त्रिशला शहा

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ असा हा राजहंस – लेखक : श्री व्यंकटेश श्रीपाद राजहंस  ☆ परिचय : सुश्री त्रिशला शहा ☆ 

पुस्तक : “ असा हा राजहंस “ 

लेखक : व्यंकटेश श्रीपाद राजहंस 

प्रकाशक : अनुबंध प्रकाशन, पुणे.

किंमत : रु. ३२५ / – 

‘ रतीचे जया रुप लावण्य लाभे

कुलस्त्री जसे हास्य ओठात शोभे

सुधेसारखा साद, स्वर्गीय गाणे

असा बालगंधर्व आता न होणे ‘

— शब्दप्रभू गदिमा यांचे हे शब्द सार्थ ठरवणारा, संगीत नाटकाला आभाळाची उंची देणारा, आपल्या स्वर्गीय गाण्याने रसिकांना रिझवणारा एक अव्दितीय कलाकार म्हणजे नारायण श्रीपाद राजहंस.

अशा या स्वर्गीय आवाजाची आणि अभिनयाची दैवी देणगी लाभलेल्या बालगंधर्व यांचे जीवनचरित्र मांडणारे असा हा राजहंस हे पुस्तक. आणि ते लिहीलयं कुणी तर बालगंधर्व यांचे धाकटे बंधू व्यंकटेश श्रीपाद राजहंस यांनी. बालगंधर्वांच्या नाटकांच्या दौऱ्यामधे त्यांच्या पाठीशी सावलीप्रमाणे रहाणारे हे व्यंकटेश उर्फ बापू.

खरतरं आपल्या वडिलांच्यापासून ते नारायण राजहंस उर्फ नाना यांचा आणि इतर भावंडाबद्दल बापूंनी लिहीलेल्या या आठवणींचे बाड, बापूंची मुलगी निलांबरी बोरकर यांच्याकडे बापूंनी सुपूर्द केले आणि निलांबरी बोरकर यांनी ते सुमती दसनुरकर यांच्याकडे सुमतीताईंच्या मागणीवरुन दिले कारण बालगंधर्वांवर पुस्तक लिहीण्याचा त्यांचा मानस होता. अशा रितीने झालेल्या या लिखाणाच्या प्रवासातून आपल्यापुढे साक्षात राजहंस घराण्याचा इतिहास उलगडत जातो.

श्रीपाद राजहंसांना शंकर, नारायण आणि व्यंकटेश ही तीन मुले आणि वेणूताई ही मुलगी. अन्नपुर्णाबाईंच्या आणि त्यांच्या सासर माहेरच्या सुसंस्कारित वातावरणात वाढलेली ही मुले. श्रीपाद राजहंस यांची नोकरी मालेगांवी असल्याने आणि त्यांचे नातेवाईक म्हाळस दांपत्याला पुत्रसुख नसल्यामुळे लहानपणापासूनच शंकर व नारायण या दोन मुलांचे संगोपन आणि शिक्षण जळगाव येथे झाले. नारायण याची गाण्याची आवड लक्षात घेऊन श्री. म्हाळस यांनी त्याला पेटी व तानपुरा आणून देऊन एका गायन शिक्षकाची नेमणूक केली. गायनाचे उपजत जाण असलेल्या आणि गुरुवर्यांकडून मिळालेल्या तालमीतून नारायणाचे गाणे बहरतच होते. अनेक मान्यवर मंडळींसमोर गायन करण्याची संधी नारायणला मिळाली. अनेक दिग्गजांकडून शाबासकी मिळवणाऱ्या नारायणचे गाणे खुद्द लोकमान्य टिळकांनी ऐकले, 13 वर्षाच्या नारायणने टिळकांसमोरच्या बैठकीत खट, आसावरी रागातून अनेक चीजा सादर करुन श्रोत्यांना अगदी मंत्रमुग्ध केले, हे पाहून ऐकूनच लो. टिळकांनी ‘ अरे हा तर बालगंधर्व अशी उपाधी नारायणला दिली तो दिवस होता ९ एप्रिल १९०२. याच दिवसापासून नारायण राजहंस हा बालगंधर्व म्हणून ओळखला जाऊ लागला.

यानंतरचा बालगंधर्वांचा सांगितिक प्रवास म्हणजे एक सुवर्णकाळच ठरला. किर्लोस्कर नाटक कंपनीमधे प्रवेश करुन त्यांनी संगीत नाटक मोठ्या उंचीवर नेऊन ठेवले. त्याकाळात नाटकातील स्त्री भूमिका पुरुषच करीत असत, या संधीचे बालगंधर्वांनी अक्षरशः सोने केले. सौभद्र, शारदा, शाकुंतल, मानापमान, स्वयंवर, संशयकल्लोळ, एकच प्याला, मत्स्यगंधा अशा अनेक नाटकातील सुभद्रा, भामीनी, शारदा, सिंधू, रेवती, द्रौपदी, रुक्मिणी अशा अनेक स्त्रीभुमिका आपल्या अभिनयाने आणि गायनाने अजरामर केल्या. संगीत रंगभूमीला बालगंधर्वांमुळे सोन्याचे दिवस आले.

बालगंधर्वांच्या या नाट्यप्रवासात व्यंकटेश उर्फ बापू या धाकट्या भावाने त्यांना खूप मोलाची साथ दिली, खरतर ते स्वतः ही गायन आणि अभिनय उत्तम करायचे पण आपल्या मोठ्या बंधूप्रेमाखातर त्यांनी फार थोड्या नाटकातून भुमिका केल्या. लहान असून मोठ्या भावाचे तेच लाड पुरवायचे. प्रत्येकाच्या आयुष्यात काही बरे वाईट प्रसंग येतातच, तसे बालगंधर्वांच्या वाट्यालाही आलेच. गोहरबाईच्या रंगभूमी पदार्पणामुळे काही वेळा व्यथित होण्याचे प्रसंग दोघांच्याही वाट्याला आले, वाढत्या वयामुळे उद्भवणाऱ्या तब्येतीच्या तक्रारीमुळे नाटक सोडून काही दिवस बालगंधर्व बापूंसमवेत त्यांच्या मुळ गावी नागठाण्यातही राहिले. पुणे, मुंबई, नाशिक, नागपूर, कोल्हापूर असे अनेक नाटकांचे दौरे केले असले तरी बालगंधर्वांनी आपल्या नाटकाचा, अभिनयाचा पहिला नाट्यप्रयोग सौभद्र या नाटकाद्वारे मिरज मधे केला. हे खूप उल्लेखनीय आहे.

वयाच्या ८८ व्यावर्षी संपूर्ण राजहंस कुटूंबातील व्यक्ती, नाट्यक्षेत्र, गायनक्षेत्र, अनेक गावातील रहाण्याचे अनेक प्रसंग, बरे वाईट अनुभव, सांपत्तिक स्थिती, वडिलोपार्जित गावे, नातेसंबंध या साऱ्यांबद्दलच्या आठवणी लिहून काढणं म्हणजे मेंदूला ताण दिल्यासारखेच पण सुमती दसनुरकरकरांच्या प्रेमळ आग्रहाने बापूंनी हे आत्मचरित्रपर लेखन केलं. आणि बापूंच्या कन्या निलांबरीताईंनी ते लेखिका सुमतीबाई आणि संपादिका डॉ. माधवी वैद्य यांच्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोहोचविले.

बालगंधर्वांवर अनेक पुस्तकांतून बरेच वाचले, ऐकले असले तरी त्यांचा खरा इतिहास या आत्मचरित्रातून वाचकांपर्यंत पोहोचला यात शंकाच नाही, अतिशय सुरेख आणि वाचनीय असे हे पुस्तक आहे, वाचकांनी नक्कीच वाचावे.

परिचय : सुश्री त्रिशला शहा

मिरज

 ≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ “हिंदुत्वाचे विश्वप्रवक्ते स्वामी विवेकानंद” – लेखिका : सौ. अंजली दिलीप गोखले – परिचय : कर्नल शरदचंद्र पाटील ☆ परिचय – सौ. उज्ज्वला केळकर ☆

सौ. उज्ज्वला केळकर

? पुस्तकांवर बोलू काही ?

☆ “हिंदुत्वाचे विश्वप्रवक्ते स्वामी विवेकानंद” – लेखिका : सौ. अंजली दिलीप गोखले – परिचय : कर्नल शरदचंद्र पाटील ☆ परिचय – सौ. उज्ज्वला केळकर

पुस्तक : हिंदुत्वाचे विश्वप्रवक्ते स्वामी विवेकानंद 

लेखिका : सौ. अंजली दिलीप गोखले.

मो. नंबर : ८४८२९३९०११ (+91 84829 39011)

प्रकाशक : विवेकानंद केंद्र मराठी प्रकाशन विभाग, पुणे

पृष्ठ्संख्या : ३५६.

मूल्य. रु. ४००/-

कर्नल शरदचंद्र पाटील

या पुस्तकाचे मुखपृष्ठ इतके आकर्षक आहे की, पाहताक्षणीच पुस्तक हातात घेऊन पाहण्याची इच्छा होते. हिंदुत्वाचा भगवा ध्वज, त्यावर सर्व विश्वाचा – विशेषत: अमेरिका, यूरोप आणि आफ्रिकेचा नकाशा, ध्वजाच्या कडांचे ज्वाळांमध्ये रूपांतर, समोर (त्यांच्या पारंपरिक भगव्या वेषामधील) स्वामी विवेकानंद आणि त्यांच्या पाठीमागे त्यांचा जयजयकार करणारा हजारो लोकांचा समूह आणि हे सर्व काळ्या अंधारातून वर आलेले! वा! मुखपृष्ठावरूनच पुस्तकाचे प्रयोजन लक्षात येते. मलपृष्ठावर मोजक्या दहा ओळीत स्वामीजींचे जीवनकार्य मांडलेले. त्या ओळी अशा आहेत :

… स्वामीजींच्या आईने भगवान शंकराकडे ज्या, जशा सुपुत्राची मागणी प्रार्थनेने केली होती, तसेच होते स्वामीजी…

… त्यांच्यातले सद्गुण ओळखून वडिलांनी जसे मार्गदर्शन केले, तसेच घडले स्वामीजी…

… सद्गुरू रामकृष्ण परमहंसांनी आपल्या पट्ट्शिष्याला ओळखून, त्याला प्रेमाने आपलेसे करून, आपल्या ज्ञानाची ओंजळ पुरती रिकामी करून त्याला जशी झळाळी दिली, तसे तेज:पुंज बनले स्वामीजी…

… आपल्या गुरुदेवांच्या इच्छेप्रमाणे आयुष्यात फक्त त्यांची इच्छापूर्ती करण्यासाठी झटले स्वामीजी…

आपल्या मातृभूमीबरोबर सगळ्या जगाच्याच हितासाठी झटले स्वामीजी…

… ‘हे विश्वची माझे घर’ म्हणत ज्ञानदेवांचे पसायदान आचरणात आणून आपल्या आयुष्याची अक्षरश: आहुती दिली ती स्वामीजींनी…

स्वामीजींचा संपूर्ण जीवनपट अगदी तपशीलवारपणे २८ प्रकरणांमध्ये लेखिकेने मांडला आहे. १२ जानेवारी १८६३ रोजी, म्हणजे मकरसंक्रांतीच्या पहाटे विश्वनाथ दत्त आणि भुवनेश्वरी देवी या दांपत्याच्या जीवनात स्वामीजींचा जन्म झाला. जणु हिंदू धर्मावर आलेले मळभ दूर करण्यासाठी, धर्माच्या संकल्पनेत आणि आचरणात आमूलाग्र बदल घडविण्यासाठीच नरेंद्र या बाळाचा जन्म झाला होता.

नरेंद्र उर्फ बिले याला लहानपणापासूनच ध्यान धारणेची आवड होती. तो एकपाठी होता, मैदानी खेळात प्रवीण होता, संगीतामध्ये आणि गाण्यामध्ये त्याला रुचि होती आणि वाचनाची तसेच निरीक्षणाची त्याला आवड होती. कॉलेजमध्ये एकदा प्राचार्य वर्ड्स्वर्थची कविता शिकवत होते. ते म्हणाले – “मनाची विशुद्धता आणि एखाद्या लक्ष्यावरील पूर्णत्व यामुळे दिव्य अनुभूती येऊ शकते. अशी दिव्य अनुभूती घेतलेला एकच महापुरुष मी पाहिलेला आहे आणि तो महापुरुष म्हणजे दक्षिणेश्वराचे पुजारी रामकृष्ण परमहंस. तेच नाव नरेंद्रच्या मोठ्या चुलतभावाने मोथ्या आदराने घेतले. त्यामुळे त्याच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आणि तो रामकृष्ण परमहंसांचे दर्शन घ्यायला दक्षिणेश्वरला गेला. तिथून पुढे नरेंद्र आणि रामकृष्ण परमहंस यांचा संपर्क वाढतच गेला. त्याची परिणति स्वामीजी हे रामकृष्णांचे पट्ट्शिष्य बनण्यात झाली.

स्वामीजी पाच वर्षे श्री रामकृष्ण परमहंस यांच्या सानिध्यात राहिले. गुरुंनी त्यांना वेदान्तासह सर्व ज्ञान प्रदान केले. गुरूंच्या महानिर्वाणानंतर सर्व शिष्यांनी एक मठ स्थापन केला. त्यानंतर स्वामीजींनी अनेक टप्प्यांमध्ये भारतयात्रा केली. स्वामीजी जिथे जात तिथे लोकांना आपलेसे करत. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची, बोलण्याची सर्वांवर छाप पडे. या भारत यात्रेची सांगता कन्याकुमारीला झाली, जिथे समुद्रातील एका खडकावर स्वामीजी पोहत पोहत गेले आणि तेथे त्यांनी सलग तीन दिवस ध्यान केले.

त्यांच्या अनुयायांनी पैसे गोळा केले, खेतरीच्या राजाने वित्तसहाय्य केले आणि स्वामीजी शिकागोच्या सर्व धर्म परिषदेला जाऊ शकले. त्यांच्या भाषणाची सुरवात त्यांनी ‘लेडिज अ‍ॅण्ड जंटलमेन’ या शब्दांनी न करता ‘माय ब्रदर्स अ‍ॅण्ड सिस्टर्स ऑफ अमेरिका’ या शब्दांनी केले आणि त्या शब्दांनी इतिहास घडवला. फक्त एका धर्मपरिषदेला गेलेले स्वामीजी तब्बल दोन वर्षे अमेरिका आणि इंग्लंड इथे राहिले. त्यांनी हिंदू धर्माविषयी सर्व लोकांच्या सर्व शंका दूर केल्या, अनेक शिष्य मिळवले आणि भारत भूमी चा उद्धार करण्याच्या दिशेने ठोस पावले टाकली.

भारतात परतल्यावर त्यांनी बेलूरच्या मठाची स्थापना केली हिंदू धर्मियांचे कर्म कांड कमी कसे करता येईल ते पाहिले, शेकडो व्याख्याने दिली (त्यातल्या अनेकांचे नंतर शिष्यांनी पुस्तकांमध्ये रूपांतर केले) आणि देशात जागृती निर्माण केली. त्यांची प्रकृती साथ देत नव्हती तरी त्यांनी देशभर धर्मजागृतीचे कार्य सुरूच ठेवले. शेवटी ४ जुलै १९०२ रोजी स्वामीजींनी महासमाधी घेतली.

मी इथे अगदी संक्षिप्तपणे लिहिले आहे. पण लेखिकेने स्वामीजींच्या कार्याचे अगदी तपशीलवार वर्णन केले आहे. लेखिकेने स्वत: स्वामीजींच्या कार्याचे जे विश्लेषण केले आहे, ते सुद्धा अतिशय सखोलपणे केलेले आहे. उदा. स्वामीजींचे शिक्षणाविषयीचे विचार मांडताना लेखिका म्हणते – स्वामीजींच्या मते परकीय नियंत्रण नसलेल्या पद्धतीने आपल्याच ज्ञानाच्या विभिन्न शाखांच्या अध्ययनाची आज आपल्याला जरूर आहे. आजच्या तरुणांनी असे शिक्षण घेतले पाहिजे, की ज्यायोगे उद्योगधंद्याची वाढ होईल आते फक्त नोकरीच्या मागे न लागता आपली उपजीविका करू शकतील आणि आपल्या आपत्तींना तोंड देण्यास समर्थ होतील. (योगायोगाने अगदी हेच विचार माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडले आहेत.)

पुढे एके ठिकाणी लेखिका म्हणते – आत्तापर्यंत स्वामीजींबद्दल हिंदू धर्म, योग, तत्त्वज्ञान, वेद, वेदान्त, अध्यात्म, परमार्थ, भारतभ्रमण, गरिबांबद्दल असलेली कणव, शिष्यांवरचे प्रेम, आपुलकी, गुरुदेव व कालीमाता यांच्या बद्दलचा आदर, ओढ, भक्ती, अमेरिका – इंग्लंडमध्ये केलेला वेदांचा प्रसार, प्रचार, मठ स्थापना, प्रवचने असेच सगळे समजून घेत आलोय. पण स्वामीजी गीतकार, संगीतकार, गायन – वादन यामध्येही तेवढेच तरबेज होते, होते हे वाचून फक्त आणि फक्त थक्क व्हायला होते. एकाच व्यक्तीत एवढे गुण? केवळ अशक्य वाटते. पण त्यांच्यासाठी कोणतीही गोष्ट अशक्य नव्हतीच. सर्वगुणसंपन्न या शब्दाचा खरा अर्थबोध विवेकानंदांना समजून घेताना होतो.

आणखी एके ठिकाणी लेखिका म्हणते – स्वामी विवेकानंद जन्माला आले भारतामध्ये – पूर्वेकडे. त्यांचे कार्यक्षेत्र ठरले पश्चिमेकडे. पूर्व आणि पश्चिम, भारत आणि जग, हिंदू संस्कृती, ख्रिस्ती धर्म, इस्लाम या सगळ्यांचा वेध त्यांनी घेतला. इतिहास, विज्ञान, तत्त्वज्ञान या सगळ्यांचेच त्यांना समान सर्वार्थ आकलन होते.

स्वामीजींनी भ्याडपणाला कधीही थारा दिला नाही. ते नेहमी म्हणायचे की गृहस्थाश्रमी माणसाने नेहमी अन्यायाचा सबल प्रतिकार केला पाहिजे. त्यासाठी शक्तिवान असले पाहिजे. स्वामीजींनी कधीही मांसाहार त्याज्य मानला नाही.

पुस्तक परिचयामध्ये प्रत्येक गोष्ट लिहिता येत नाही (नाहीतर तेच एक पुस्तक बनेल). पण शेवटी इतकेच सांगू इच्छितो की, हे पुस्तक अतिशय चांगले आहे. पूर्णपणे व्याकरण दोषविरहित आहे. सोप्या, समजणार्‍या भाषेत आहे. माझ्यामते हे पुस्तक प्रत्येक मराठी घरात असलेच पाहिजे. (मला नक्की ठाऊक नाही; पण लेखिकेशी संपर्क केल्यास कदाचित सवलतीच्या दरात पुस्तक मिळू शकेल.)

परिचय : कर्नल शरदचंद्र पाटील (शरद)

प्रस्तुती : सौ. उज्ज्वला केळकर 

संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३  सेक्टर – ५, सी. बी. डी. –  नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र

मो. 836 925 2454, email-id – kelkar1234@gmail.com 

≈संपादक –  श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ “द पॉवर ऑफ युवर सबकॉन्शियस माईंड” – लेखक : डॉ. जोसेफ मर्फी – अनुवादिका : सौ. मंजुषा मुळे ☆ परिचय – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ “द पॉवर ऑफ युवर सबकॉन्शियस माईंड” – लेखक : डॉ. जोसेफ मर्फी – अनुवादिका : सौ. मंजुषा मुळे ☆ परिचय – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

पुस्तक – द पॉवर ऑफ युअर सबकॉन्शियस माईंड  

लेखक : डॉ. जोसेफ मर्फी

अनुवादिका : सौ. मंजुषा मुळे

 ९८२२८४६७६२

प्रकाशक : रिया पब्लिकेशन्स, कोल्हापूर

पृष्ठसंख्या : २८८

मूल्य : रु. ३५०/-

सौ. मंजुषा सुनीत मुळे

☆ द पॉवर ऑफ युवर सबकॉन्शियस माईंड – – तुमच्या सुप्त मनाचा वेध 

‘शक्तिमान ‘ नावाची एक मालिका काही वर्षांपूर्वी दूरदर्शनवर होऊन गेली. ती किशोरवयीन मुलांमध्ये खूप आवडती होती. कारण शक्तिमान हा कोणत्याही संकटाचा सामना करु शकत होता व दुष्ट प्रवृतींचा नाश करत होता. आपणही असेच शक्तिमान व्हावे असे प्रत्येक मुलाला वाटे. आपल्यालाही नाही का वाटत आपण इतरांपेक्षा श्रेष्ठ असावे ? पण एखादी दैवी शक्ती कशी प्राप्त करायची ? दैवी शक्ती खूप वेगळा विषय आहे. पण आपण आपल्यातील शक्तीला तरी ओळखतो का ? अशी एक शक्ती प्रत्येक व्यक्तीमध्ये आहे की जी दुर्लक्षिली गेली आहे. ही शक्ती म्हणजे मनाची शक्ती, मन: सामर्थ्य. पण ही शक्ती असते कुठे, त्याचा शोध कसा घ्यायचा आणि ही शक्ती वापरायची कशी ? या सर्व प्रश्नांची उत्तरे देणारे, खूप वेगळ्या विषयावरील पुस्तक म्हणजे डॉ. जोसेफ मर्फी यांचे ‘ द पॉवर ऑफ युवर सबकॉन्शियस माईंड ‘. या इंग्रजी पुस्तकाचा अनुवाद केला आहे सौ. मंजुषा मुळे यांनी.

‘मन मनास उमगत नाही ‘, ’ मन वढाय वढाय ‘, ‘ तोरा मन दर्पण कहलाये. ‘ अशा अनेक काव्यपंक्ती आपल्या कानावर पडलेल्या आहेत. एवढेच नव्हे तर आपण अनेक वेळेला म्हणतो ‘ मी माझ्या मनाला विचारुन बघतो ‘ किंवा ‘ माझं एक मन असं सांगतंय पण दुसरं मन तयार होत नाहीय ‘…. कोणतं हे दुसरं मन ? मनं आहेत तरी किती? खरंच दुसरं मन असतं का ? या सर्व प्रश्नांची उत्तरे या पुस्तकात मिळतात. एकदा का या दुस-या मनाचा शोध लागला की त्याच्या मदतीने आयुष्यात कशी वाटचाल करायची आणि यशस्वी कसे व्हायचे याचा मूलमंत्र देणारे हे पुस्तक. अद्भूत वाटणारी पण शास्त्रीय आधार असणारी माहिती आपल्यासमोर येते. या शक्तीचा वापर ज्यांना आधी माहीत नव्हता पण माहित झाल्यावर ज्यांनी तिचा उपयोग करुन घेतला अशा अनेक व्यक्तींची नावासह उदाहरणे या पुस्तकात वाचायला मिळतात. मग आपणही नकळतपणे आपल्या आयुष्यात घडलेल्या प्रसंगांची आठवण झाल्यामुळे तुलना करु लागतो व त्यातील बरेचसे मुद्दे आपल्याला पटू लागतात. लेखकाने बायबलातील अनेक वचनांचा उल्लेख वारंवार केला आहे. तसेच मनोभावे केलेल्या प्रार्थनेचे महत्त्व व सामर्थ्य काय असते ते ही दाखवून दिले आहे. त्यामुळे अध्यात्म, चिंतन, भक्ती यासारखी मनोबल वाढवणारी तत्वे सर्वत्र सारखीच आहेत याची जाणीव होते. बाहेरचे मन आणि आतले मन यांना जोडणारा एक अदृश्य धागा आपणच शोधून काढला तर सुप्त मनाच्या सामर्थ्यामुळे आपण आयुष्यात यशस्वी होऊ शकतो हे सोदाहरण पटवून देणारे हे पुस्तक आहे. किंबहुना आपल्या आयुष्यातील यशापयश हे बहुतांशी आपल्या विचार पद्धतीवरच अवलंबून असते हे लक्षात आणून देण्याचे काम या पुस्तकाने केले आहे.

या पुस्तकाची अनुक्रमणिका जरी पाहिली तरी पुस्तकाचे अंतरंग लक्षात येते. सुप्त मन (सबकॉन्शियस माईंड) म्हणजे काय, त्याचे सामर्थ्य काय आहे, मन कसे काम करते, सुप्त आणि जागृत मन यात काय फरक आहे, आपल्याला हवे असणारे परिणाम कसे साधायचे, शक्तीचा वापर कसा करावा या सर्व प्रश्नांची उकल या ठिकाणी केली आहे. शिवाय, सुसंवादी नातेसंबंध, मानसिक आरोग्य, निर्भय मन यासाठी सुद्धा सुप्त मनाची शक्ती कशी उपयोगी पडते, कशी वापरावी हे लेखकाने सांगितले आहे. मनाचे तारुण्य टिकवून ठेवले तर नैसर्गिक वार्धक्याची भीती बाळगायचे कारण नाही असा अत्यंत महत्त्वाचा संदेशही आपल्याला वाचायला मिळतो. प्रत्येक प्रकरणाच्या शेवटी महत्वाचे मुद्दे मांडले आहेत. त्यामुळे त्याची उजळणी केली तरी मनाची तयारी होऊ शकेल. यातील काही मुद्दे सांगायचे म्हटले तर अपुरेपण वाटेल. त्यामुळे प्रत्यक्ष वाचन करणेच योग्य ठरेल.

हे पुस्तक वाचत असताना एक गोष्ट जाणवते ती म्हणजे जरी हे पुस्तक पाश्चात्य लेखकाने लिहिले असले तरी काही तत्वे, विचार हे सर्वत्र सारखीच, त्रिकालाबाधित सत्यच असतात. ‘ पेराल तसे उगवेल ‘ याची जाणीव लेखकाने अनेक वेळेला करून दिली आहे. आपल्या वागण्यावर इतरांचे वागणे अवलंबून असते. इच्छा असेल तर मार्ग सापडतो. धार्मिक व अध्यात्मिक वचने वाचताना आपल्या ‘दासबोध किंवा ‘मनाच्या श्लोकां’ ची आठवण झाल्याशिवाय रहात नाही. ‘ आयुष्य स्वतःला नेहमी नव्या दमाने नवे कपडे घालत असते ‘ हे वाक्य वाचताना गीतेतील ‘ वासांसी जीर्णानी…. ‘ या श्लोकाचे स्मरण होणे अपरिहार्य आहे. पुस्तकातील अनेक वाक्ये ही सुविचारांप्रमाणे कायम लक्षात ठेवावीत अशी आहेत.

‘यश म्हणजे यशस्वी जीवन पद्धती. ‘ ‘ मन कधीही निवृत्त होत नाही’, ‘ विचार बदला, मग तुमचे विधिलिखित तुम्हीच बदलाल ‘ अशी अनेक उदाहरणे देता येतील.

हा परिचय थांबवण्यापूर्वी एका गोष्टीचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. लेखकाने हे पुस्तक स्वानुभवाने लिहिले आहे. लेखक डॉ. मर्फी हे असाध्य रोगाने आजारी होते. या आजारपणाच्या काळात त्यांनी सुप्त मनाच्या शक्तीला जागृत करुन गंभीर आजारावर विजय मिळवला आहे. त्यामुळे हे लेखन ‘ आधी केले, मग सांगितले ‘ या पद्धतीचे आहे.

थोडक्यात, आपण कसे आहोत, कसे असायला पाहिजे आणि आपण तसे होऊ शकतो हा आत्मविश्वास जागृत करणारे हे पुस्तक स्वतः चे आयुष्य यशस्वी करण्यासाठी उत्तम मार्गदर्शक आहे. काही तत्वे आणि काही तंत्रे माणसाचे आयुष्य बदलू शकतात आणि आयुष्य घडवू शकतात.

सुप्त मनाला जागे करुन जागृत मनाला योग्य मार्ग दाखवणारे हे पुस्तक मराठीत अनुवादित केल्याबद्दल सौ. मंजुषा मुळे यांना धन्यवाद ! 

पुस्तक परिचय – श्री सुहास रघुनाथ पंडित

सांगली (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ “यू हॅपिअर ” – इंग्रजी लेखक : डॉ. डॅनियल जी. आमेन, एमडी – मराठी अनुवाद : सुश्री वीणा रारावीकर ☆ परिचय –  श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆

श्री हर्षल सुरेश भानुशाली

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ “यू हॅपिअर ” – इंग्रजी लेखक : डॉ. डॅनियल जी. आमेन, एमडी – मराठी अनुवाद : सुश्री वीणा रारावीकर ☆ परिचय –  श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆

पुस्तक : यू हॅपिअर

इंग्रजी लेखक : डॉ. डॅनियल जी. आमेन, एमडी

मराठी अनुवाद : सुश्री वीणा रारावीकर

पृष्ठ: २४४

मूल्य: ३५०₹

(तुमच्या मेंदूच्या प्रकारावर आधारित आनंदी राहण्यासाठी न्यूरोसायन्समधील ७ रहस्य…)

न्यूयॉर्क टाईम्सचे बेस्टसेलिंग लेखक डॉ. डॅनिअल आमेन यांनी न्यूरोसायन्सच्या सात रहस्यांचा उलगडा केला आहे. या रहस्यांच्या माध्यमातून एखादी व्यक्ती 30 दिवसांमध्ये 30 टक्के जास्त आनंदी राहू शकते. तुमचं वय किती आहे, तुमची वाढ कशा पद्धतीने झाली आहे, तसंच तुमची आनुवंशिक वैशिष्ट्ये किंवा तुमचा वर्तमान कसाही असला तरीही ही रहस्यं तुम्हाला आनंदी राहण्यात मदत करतात.

आनंद हे मेंदूचं कार्य आहे.

जर मेंदू निरोगी असेल तर आयुष्य आनंदाने जगता येऊ शकतं.

डॉ. आमेन यांनी 155 देशांमधील 200000 पेक्षाही जास्त मेंदूंच्या स्कॅन्सचा अभ्यास केला. त्या अभ्यासाद्वारेच त्यांनी आनंदासाठी महत्त्वाच्या ठरणाऱ्या मेंदूच्या पाच प्राथमिक प्रकारांचा आणि न्यूरोसायन्समधील सात रहस्यांचा शोध लावला. ‘यू हॅपिअर’मध्ये त्यांनी याची सविस्तर माहिती दिली आहे. तुम्ही आनंदी होण्यासाठी यात काही शास्त्रशुद्ध आणि व्यावहारिक उपाय सांगितले आहेत.

जसे की :

  • तुमच्या व्यक्तिमत्त्वानुसार तुमच्या मेंदूचा प्रकार कसा ओळखायचा आणि स्वतःसाठी उपयुक्त असलेले आनंदी होण्यासाठीचे उपाय कसे करायचे
  • स्वतःची मनःस्थिती सतत चांगली ठेवण्यासाठी स्वतःच्या मेंदूचे सर्वांगीण आरोग्य कसे सुधारायचे
  • मेंदूत सुरू असणाऱ्या गोंधळापासून स्वतःला वेगळे करून स्वतःच्या आनंदाचे रक्षण कसे करायचे
  • स्वतःच्या आनंदात वाढ करण्यासाठी घ्यायचे सात सोपे निर्णय आणि विचारायचे सात प्रश्न कोणते

स्वतःचा आनंद सतत कायम ठेवणं हा एक रोज चालणारा प्रवास आहे. ‘यू हॅपिअर’मध्ये डॉ. आमेन तुम्हाला न्यूरोसायन्सवर आधारित काही सवयी, पद्धती आणि पर्यायांबद्दल सांगतात. यामुळे तुमची मनःस्थिती तर चांगली राहतेच, शिवाय तुम्ही रोज स्पष्टपणे ठरवलेली मूल्ये, उद्देश्य आणि ध्येयांवर आधारित आयुष्य जगण्यासाठी तुम्हाला त्याची मदत होते.

– – हे पुस्तक सर्वांनी जरूर वाचावे असे आहे.

परिचय : श्री हर्षल सुरेश भानुशाली

पालघर 

मो. 9619800030

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ आक्रोश आसवांचा (कविता-संग्रह)… कवी : श्री विष्णू सोळंके – परिचय : प्रा. डॉ. बालाजी लाहोरकर ☆ प्रस्तुती – सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

 

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ पुस्तकांवर बोलू काही ☆ आक्रोश आसवांचा (कविता-संग्रह)… कवी : श्री विष्णू सोळंके – परिचय : प्रा. डॉ. बालाजी लाहोरकर ☆ प्रस्तुती – सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

पुस्तक : आक्रोश आसवांचा (कविता-संग्रह)

कवी : श्री विष्णू सोळंके

परिचय : प्रा. डॉ. बालाजी लाहोरकर

श्री विष्णू सोळंके

सोळंके यांच्या कवितेचा आत्मा हा रस्त्यावरचा सामान्य माणूस आहे, गरिबी, दहशत, मृत्यू, उपेक्षा अनुभवता येते. त्यांनी आपल्या साहित्यात सजीव अनुभवांना शब्दबद्ध करतांना सामाजिक बांधिलकीचे भानही सदैव जागृत ठेवले आहे.

आक्रोश आसवांचा या कविता संग्रह यामधील कविता या १९९७ ते २००८या कालावधीत लिहिल्या गेलेल्या आहेत. त्या त्यांच्या स्वतःच्या भाव जीवनातील सुख दुःखाच्या वास्तव अनुभवांवर आधारलेल्या आहेत. या कवितांचा उत्कटपणा, आशयघनताआणि मनस्विता वाचकाला गहिवरून टाकते. हे मनोगत म्हणजे कविच्या मनोभूमीतील एक आत्मीय आत्मपर संवाद आहे. जिथे कविता ही केवळ लेखनाची प्रकिया नसुन, जीवनातील प्रत्येक संघर्षाला तोंड देण्याची एक सजिव आणि स्नेहवर्धक साथ आहे.

या कविता संग्रह याला दिलेल्या प्रस्तावनेत जेष्ठ समिक्षक व साहित्यिक डॉ श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी विष्णू सोळंके यांचा काव्य प्रवास हा अंतर्मुखतेचा, आत्मभानाचा आणि प्रामाणिक अभिव्यक्तीचा प्रवास असल्याचे अधोरेखित केले आहे. त्यांच्या मते, कविता ही अनुभवातून साकार होते; केवळ विचाराने नव्हे, तर अनुभवाच्या तीव्रतेतून जन्म घेते. ही तीव्रता जेव्हा मनात झिरपत राहते, तेव्हाच खरी कविता घडते, असे ते स्पष्ट करतात.

विष्णू सोळंके यांनी आपल्या कवितेला कोणत्याही शैलीतील चौकटीत बंदिस्त केले नाही. त्यानी मुक्तपणे, पण या मनःपूर्वक आणि आत्म्याशी इमान राखून कविता लिहिल्या आहेत. या कवितांमध्ये सामाजिक जाणीव, माणूसकीचा शोध, अंतर्मुखता, आशावाद आणि सौंदर्यदृष्टी यांचे सुरेख संमेलन आढळते. जोशी यांचे मते ही कविता केवळ वैयक्तिक भाव प्रदर्शन नाही, तर ती सामूहिक वेदनांचे प्रतिबिंब आहे. मानवीअध:पतन, विसंवेदना आणि विस्मृती यांचे ते प्रातिनिधिक दर्शन आहे. या कवितांत एक जागृत सामाजिक भान आहे आणि चिंतनशीलता आहे. त्याच बरोबर या कवितांमध्ये सौंदर्य, करुणा, आणि श्रमशीलतेची उदात्त भावनाही प्रकर्षाने जाणवते. कवीच्या आत्मिक सामर्थ्याला पूर्ण न्याय देण्यासाठी, त्यांनी ही वाटचाल अधिक सखोल आणि प्रगल्भ अभिव्यक्तीकडे करावी, अशी शुभेच्छा जोशी यांनी दिल्या आहेत. या कविता संग्रहातील विविध कविता स्वतः मध्ये एक स्वतंत्र अर्थसंपन्नता बाळगून आहेत.

जमते का ते बघतो, ही कविता मनाच्या सुक्ष्म भाव स्थितीचा सुरेल प्रवास उभा करते. जमते का ते बघतो, ही पुनरुक्ती एकाच वेळी प्रश्नार्थक आणि आर्त भासवते. नात्यातील अव्यक्त ओलावा, स्वप्नातील संवाद, स्मृती चं भिजणं आणि सुखाच्या शोधातील एकाकी वाटचाल हे सगळं मनाला हलवून जाते. कवितेचा लहेजा अंत्यंत कोमल आणि भावस्पर्शी आणि गुढ आहे. शेवटच्या ओळीतून एक आशावादी सूर ही प्रकटतो.

या नभाला वेचतो मी, ही कविता संवेदनशील मनाच्या आत्मकथनासारखी वाटते. कवी आपले दुःख, निशब्द आक्रोश, मूक प्रतिकार या गोष्टी प्रभावी शब्द रचनेतून मांडतो. शांत शहरात दंगलीशी खेळतो, ही ओळ विशेष अर्थवाही असून समाजातील विरोधाभास दर्शवते.

सांजवेळी आठवांना, ही कविता आठवणींच्या नाजूक धाग्यांनी विणलेली आहे. डायरीची मूक पाने, गंध मागणे, लाजणा- या फुलांना न्याहाळणे अशा प्रतिमा कवितेला कोमल आणि नाजूक स्पर्श देतात.

जीवना, ही कविता दुःखाच्या सखोल जाणिवेचा आर्त स्वर आहे. यातून जीवनातील शाश्वत वेदना आणि अस्तित्ववादी जाणीव दिसून येते. सावलीने या छळावे, ही कविता काळाच्या विषादपुर्ण वास्तवादावर अचूक आणि ठाशीव भाष्य करते. फुलांचे गाव काट्यापाशी बोचते, माणूसकीच्या रक्ताने रस्ते भरतात, ही रुपके समाजाच्या अंध: पतनाचे भीषण चित्र उभे करतात.

पावसाने असे… ही कविता प्रतीक्षेतील वेदना, प्रेमभंग, आणि एकाकी रिकामे पण यांचे शब्द रुप आहे.

पावलांनी असे दूर नेऊ नये… ही शैवटची ओळ हृदयस्पर्शी आणि करुणेने भारलेली आहे.

निळे चांदणे, ही गझल प्रेमाच्या नाजूक आणि कोवळ्या भावनांचे ललित चित्रण करते.

सावलीने या छळावे, पावसाने असे, निळे चांदणे हे, हाय लाजरी तुझ्या सारखी, अशा विविध कविता समाजातील वास्तव, वैयक्तिक व्यथा, प्रेमातील नजाकत, आणि जीवनातील विसंगती यांचे सर्जनशील चित्रण करतात.

प्रतीकांची सुसंगत निवड, भाषेतील लयबद्धता, सौंदर्य दृष्टी, अंतर्मुख अभिव्यक्ती आणि भावनांचा आर्त स्वर हे सारे या कवितांना एक नितांत अनुभवात्मक वाङ्मयीन उंची देतात. पावसासारख्या साध्या नैसर्गिक घटनेलाही कवी नवीन अर्थ देतो, तर प्रणयाचे सूचक स्पर्शही तो सौंदर्याने रंगवतो.

विष्णू सोळंके यांच्या कविता केवळ वाचाव्यात म्हणून नाही तर त्या अनुभवाव्यात, अंतर्मनात झिरपाव्यात,….. मनाच्या एखाद्या कोपऱ्यात शांतपणे बसून त्या आपल्याला बोलावत राहतात…

परिचय : प्राचार्य डॉ बालाजी लाहोरकर

मो ९८८१३६१४६९

प्रस्तुती – सुश्री मंजुषा सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ “वेगळ्या वाटेवरचा डाॅक्टर” –  मूळ इंग्लिश पुस्तक – ‘Band-Aid for a Broken Leg’ – लेखक : डेमियन ब्राऊन मराठी अनुवाद : सौ. मंजुषा मुळे ☆ परिचय – सौ.अंजोर चाफेकर☆

सौ.अंजोर चाफेकर

? पुस्तकांवर बोलू काही ?

☆ “वेगळ्या वाटेवरचा डाॅक्टर” –  मूळ इंग्लिश पुस्तक – ‘Band-Aid for a Broken Leg’ – लेखक : डेमियन ब्राऊन मराठी अनुवाद : सौ. मंजुषा मुळे ☆ परिचय – सौ.अंजोर चाफेकर ☆ 

पुस्तक : वेगळ्या वाटेवरचा डाॅक्टर  

मूळ इंग्रजी पुस्तक : “ Band-Aid for a broken leg “ 

मूळ लेखक : डॅमियन ब्राऊन 

अनुवादिका : मंजुषा मुळे 

प्रकाशक : मेहता पब्लिशिंग हाऊस, पुणे 

किंमत : ₹५९५ /-

पृष्ठे : ४६१

 

सौ. मंजुषा मुळे

मंजुषाताईंचे हे पुस्तक वाचायला घेतले आणि आफ्रिकन लोकांची गरिबी, त्यांच्यावर सतत बेतणारे जीवघेणे प्रसंग वाचून अंगावर काटा आला. त्या सर्व आव्हानांना धैर्याने तोंड देणारा, कठिण परिस्थितीत त्यांच्यावर शस्त्रक्रिया करणारा, त्यांच्यासाठी अव्याहत झटणारा हा ‘ वेगळ्या वाटेवरचा डाॅक्टर ‘.. त्याचे तिथले आव्हानांनी भरलेले जीवन या पुस्तकात उलगडत जाते. त्याचा धीटपणा, त्याची भावविवशता, त्याच्या आयुष्यातील हृदयद्रावक प्रसंग, त्याचवेळी त्याला मिळणारे तिथल्या लोकांचे भरभरून प्रेम आणि त्याच्यातील असामान्यत्व याची प्रकर्षाने जाणीव होते व मन नतमस्तक होते.

हे पुस्तक म्हणजे लेखकाचे आत्मवृत्त आहे. यात वर्णन केलेले सगळे प्रसंग लेखकाने प्रत्यक्ष अनुभवलेले आहेत. यात एकूण २२ प्रकरणे आहेत.

दक्षिण आफ्रिकेतल्या पोर्तुगीजांच्या वसाहती उठल्यानंतर, त्यासाठी संघर्ष करणाऱ्या दोन प्रमुख गटांमध्येच सत्ता स्थापनेसाठी मोठाच संघर्ष सुरू झाला होता. हे यादवी युद्ध तब्बल वीस वर्षं सुरू होतं. अंगोला या देशात कमालीचा विध्वंस झाला होता. लोकांना दैनंदिन आयुष्यही एक संकटच वाटावे अशी परिस्थिती होती. अशावेळी आंतरराष्ट्रीय पातळीवर काम करणाऱ्या एका समाजसेवी संस्थेतर्फे मानवतावादी दृष्टिकोनातून बरंच मदतकार्य सुरू केलं गेलं होतं.

लेखक डॅमियन ब्राऊन हा नुकतीच पदवी घेतलेला एक ऑस्ट्रेलियन डाॅक्टर, आफ्रिकेतील युद्धात विध्वंस झालेल्या अंगोला देशातील खेड्यात या समाजसेवी संस्थेतर्फे मानवतावादी दृष्टिकोनातून येतो. विस्फारलेल्या निष्पाप डोळ्यांनी बघणारी, अन्न भरविण्यासाठी गालांना रबरी नळ्या चिटकवलेली, जीवघेण्या थंडीपासून बचाव करण्यासाठी अंगाभोवती वर्तमानपत्र गुंडाळून एखाद्या पुलाखालच्या कोपऱ्यात रात्रभर कुडकुडत बसणारी उदासवाणी मुले बघतो. सर्वत्र अतीव गरीबीच गरीबी. ‘ मी कसा या लोकांशी जुळवून घेऊ? एकटेपणाने कसा जगू? इथल्या एकमेव हाॅस्पिटलची जबाबदारी एकटा कशी सांभाळू?’ या संभ्रमात तो असतो.

इथे वीजपुरवठा नाही. पाण्याची सोय नाही. दूरध्वनीची सोय नाही. लोकांच्या आरोग्याची खबरदारी नाही.

शाळेला छप्पर नाही. मूलभूत गरजा सुद्धा पुऱ्या होत नाहीत. सगळीकडे अजूनही युद्धसदृश वातावरणच आहे… जागोजागी पेरलेले सुरुंगही अजून तसेच आहेत.. आणि या परिस्थितीत लेखकाला जे अनेक भयानक अनुभव येतात, त्यांचं प्रत्यक्षदर्शी वर्णन त्यांनी अतिशय परिणामकारकपणे या पुस्तकात केले आहे.

अशा वातावरणातही एक जोडपे आणि त्यांचे नातेवाईक लग्नात मनापासून आनंदाने नाचतात. त्यालाही नाचायला लावतात व आनंदात सहभागी करून घेतात… तिथे गेल्या गेल्या त्याला आश्चर्याचा धक्का देणारा हा पहिला प्रसंग. या आशावादामुळे त्याला जरा वेळ उभारी वाटते, आणि या लोकांशी संवाद साधायचा असेल तर पोर्तुगीज भाषा शिकायचा संकल्प तो करतो.

एका रुग्णाच्या बाबतीत हाॅस्पिटलमधला स्थानिक कर्मचारी राॅबर्टो त्याला धमकावतो,

“ईसाबेलावर काहीच उपचार करता येणार नाहीत असं कसं म्हणता तुम्ही? शस्त्रक्रिया केली नाही तर ती नक्कीच मरेल. केल्यावरही ती मरू शकेल. पण म्हणून प्रयत्नच करायचे नाहीत? अहो नवे डाॅक्टर, तुम्हाला आमच्याबद्दल, आमच्या औषधांबद्दल काहीच माहिती नाही. आमची भाषाही तुम्हाला येत नाही. “

आणि लेखक थिजल्यासारखा संभ्रमात उभा राहतो.

एकदा एक सैनिक हातावर पडला म्हणून दवाखान्यात येतो..

“ कसं मोडलं हाड? ” असं विचारल्यावर तो सैनिक विचारतो, “ म्हणजे मोडलंय का ते?” – इतकं अज्ञान.

हाड मोडले होते यात शंकाच नव्हती. उपचारापूर्वी निदानाची खात्री करून घ्यायची ही लेखकाची सहजप्रवृत्ती. म्हणून तो इ मेल वरून युरोपातील सर्जनांना विचारीत असे, तेही त्याला आनंदाने उत्तरे पाठवीत. पण इथे औषधे नाहीत. पर्यायी औषधेही नाहीत. साधनसामग्रीही नाही. आता पुन्हा कुठचे संकट उभे ठाकेल, कुठले अरिष्ट ओढवेल याची सगळ्यांनाच सतत भीती. रोजची ही भीतीची भावना लेखकाला सतत ग्रासून टाकत असते.

अशा परिस्थितीत तो एकदा प्रेयसीला फोन करतो. ती स्पष्टपणे त्याला सांगते.. “मी तुला कोणताही आधार देऊ शकत नाही. तुला तिकडे जायचे होतं म्हणून तू मला सोडून गेलास. ” तो हतबल होतो, पण निग्रहाने काम चालूच ठेवतो… हा त्याचा निग्रह खरोखरच असामान्य म्हणावा असाच.

एकदा एका स्रीचे पोटाचे ऑपरेशन करायचे असते. भूल देण्यासाठी एकच औषध असते.. केटॅमाईन.

जे खरे तर किरकोळ शस्त्रक्रियांसाठी वेदनाशामक म्हणून वापरतात. लेखक राॅबर्टोला विचारतो,

“ निर्जंतुकरणासाठी साधन कुठे आहे?”.. त्यावेळी राॅबर्टो पेटत्या कोळशांवर ठेवलेला प्रेशर कुकर दाखवतो.. लेखकाला अस्वस्थपणामुळे घाम सुटतो. त्याही परिस्थितीत तो अपेंडिक्सचे ऑपरेशन करतो.

राॅबर्टो त्याला म्हणतो, “तुम्ही योग्य तेच केले नवे डाक्टर “

लेखक म्हणतो, “जे घडलं, जे मी पाहिलं, त्यामुळे अजूनही मला धडधडते आहे. “

परंतु या अशा परिस्थितीत सुद्धा विसाव्याचे क्षण लेखक अनुभवतो. संध्याकाळचे नदीवर फिरायला जाणे,

सूर्यास्त बघणे आणि चर्चमधून पार्श्व संगीतासारखे, वाद्याच्या साथीशिवाय गायले जाणारे पोर्तुगीज भाषेतले ते सुंदर सूर ऐकणे.

कितीही मनाला रमविण्याचा प्रयत्न केला तरी अंथरूणावर पडल्यावर लेखकाला झोप येत नसते.. ‘ आपण इथे जे सेवाधर्मी काम करतो त्याने इथल्या परिस्थितीत खरंच काही फरक पडतोय का ‘ असे विचार मनाला बोचतात. इथे आलेले रुग्ण त्याच्या डोळ्यासमोर येतात व तो अस्वस्थ होतो. गोंधळून जातो.

…. मेंदूला आलेल्या सुजेमुळे होणारा असह्य दाह शांतपणे सहन करणारा किड् जे, प्रचंड भाजलेला जोस, मलेरियाचे दोन तीन हजार पेशंटस्… मनाला वैफल्य आणणारं, अतिशय करुणाजनक तरीही प्रेरणादायक आणि त्याच वेळी भ्रमनिरास करणारं असं हे जगणं.

एका स्रीचे गर्भाशय फाटते, प्रचंड रक्तस्राव होत असताना गर्भाशयातून बाळ बाहेर येते. त्या स्त्रीला तो वाचवतो. स्त्रीचे नातलग आनंदाने गाणी म्हणायला सुरवात करतात आणि लेखक मात्र स्वतःशी म्हणतो, “माझे अश्रू आवरत नाहीत. हुंदके येतात मला. मनात दाटलेली निराशा, वैफल्याची भावना अशी बाहेर पडते आहे…. आणि हे गाताहेत.. “

असे कितीतरी चित्तथरारक प्रसंग या पुस्तकात चितारले आहेत.

माविंगामधल्या मोझाम्बिक लोकांबद्दल तो म्हणतो, “कुठलीच निराशा नाही, खिन्नता नाही, उद्वेग नाही.

कसंतरी तग धरून जिवंत रहायचं एवढेच काम. आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन, अर्धा पेला भरलेला आहे असाच. सध्या इथे युद्ध चालू नाही हाच दिलासा. ” त्यांच्या मनाचा खंबीरपणा आणि येईल त्या प्रसंगाला तोंड देण्याची शांत जिद्द पाहून लेखकाचे मन हेलावून जाते.

रात्री हाॅस्पिटलचे काम आटपून तो जवळच्या एका झोपडीत येत असतो. – तीच त्याची राहायची खोली. गादीवर पडतो. झोपडीत भरून राहिलेला असह्य वास. धुळीने माखलेले, गचाळ, माशा, किडे, मधमाश्या यांनी व्यापून टाकलेले हाॅस्पिटलचे आवार.

मनात रोज विचार येतात, ” एक स्वयंसेवक म्हणून मी इथे आलो. पण आयुष्यातील चैतन्य हरवलंय. भविष्यात आपण एकटे पडणार आहोत. भौतिक सुखसमाधान तर दूरच. कुठल्याच चांगल्या, आनंददायक गोष्टी अनुभवायला येत नाहीत. झोपायचा प्रयत्न असफल करणारे हे विचार. जाणीवपूर्णक अशा ठिकाणी येणं याला स्वार्थत्याग म्हणायचं का? पण मी हे काम स्वीकारले आहे, निरपेक्षपणे, अगदी मनापासून. “

सुदानमधे सतत गोळीबाराला बळी पडणाऱ्या रुग्णांवर उपचार करताना, सतत भीतीच्या छायेत वावरताना मन निराश होतं… “ या सगळ्याचा शेवट काय? आपण स्वतःसाठीच निरुपयोगी होऊन जाऊ का ? मला नेमकी कशाची भीती वाटते आहे?माझ्या हाताला झालेल्या जखमेची?धोकादायक विमान प्रवासाची? मदतकार्यासाठी कुठे जाण्याची माझी इच्छा आता मावळत चालली आहे. हे असले विचार यापूर्वी माझ्या मनात कधीच आले नव्हते. मी खूप थकून गेलोय. यापुढे मी हे काम करू शकणार नाही “

…. आणि मनाच्या अशा दोलायमान अवस्थेत तो ऑस्ट्रेलियाला परत जाण्याचा निर्णय घेतो. त्याच्या या निर्णयावर सिडनीतल्या ऑफीसमधे प्रतिक्रिया उमटते की त्याने अनुभवी मानसोपचार तज्ज्ञाला भेटावे.

परंतु घरी आल्यावर त्याला पुन्हा मनापासून वाटायला लागतं की तो पुन्हा अशा स्वयंसेवी कामासाठी नव्या ठिकाणी हजर होईल. आणि तो पुन्हा दुसऱ्या शहरातल्या अशाच सेवाभावी हॉस्पिटलमध्ये स्वयंसेवक म्हणून रुजू होतो.

या पुस्तकातले सर्व प्रसंग अंगावर काटा आणणारे आहेत. परंतु कुठेही अतिशयोक्ती नाही. अवास्तव चित्रण नाही. लेखकाने मनातले विचार अगदी प्रांजळपणे लिहिले आहेत. आणि मंजुषाताईंनी अनुवाद करताना हे सगळे विदारक प्रसंग आणि त्यावेळचे लेखकाच्या मनातले भाव अगदी अचूक टिपले आहेत. त्यामुळेच हे पुस्तक नक्कीच हृदयाला भिडते.

लेखक डॉ. डॅमियन ब्राऊनचे हे विलक्षण अनुभव मराठीत अनुवाद केल्यामुळे आपल्या कल्पनेपलिकडच्या एका वेगळ्याच जगाची अविस्मरणीय आणि संवेदनक्षम माणसाला विचार करायला भाग पाडणारी सफर आपल्याला घडते. मेडिसिन्स सान्स फ्राॅन्टिअर्स या सेवाभावी संस्थेचा परिचय होतो. कारण डाॅ. डॅमियन ब्राऊन हे या संस्थेतर्फे स्वयंसेवक म्हणून अफ्रिकेत गेलेले असतात. आणि हे पुस्तक म्हणजे तिथे त्यांनी प्रत्यक्ष घेतलेल्या हृदयद्रावक अनुभवांचे कथन आहे…

मंजुषाताईंच्या या अनुवादामुळे वैद्यकीय क्षेत्रातील मानवहितवादी गट व आयुष्य पणाला लावून काम करणारे डॉ. ब्राऊन यांच्यासारखे देवदूत यांचे दर्शन होते.

– – हे पुस्तक सर्वांनी जरूर वाचले तर पाहिजेच, पण हे पुस्तक आत्मपरीक्षण करायला लावते. आपापल्या घरात सुरक्षित आयुष्य जगणाऱ्या सर्वांनाच मनन, चिंतन करायला भाग पाडते.

परीक्षण  सौ.अंजोर चाफेकर, मुंबई.

≈संपादक –  श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ “लेखनिका” – लेखक : डॉ. निशिकांत श्रोत्री ☆ परिचय – श्री दादासाहेब दापोलीकर (सुमंत जुवेकर)  ☆

श्री ‘दादासाहेब दापोलीकर

लेखक परिचय 

नाव – श्री सुमंत जुवेकर – ‘दादासाहेब दापोलीकर’ या प्रयुक्त नावाने लेखन.

शिक्षण व व्यवसाय – विद्युत अभियंता

लेखन –

‘दादर तें दादर’ हे चरित्रात्मक पुस्तक प्रकाशित

तसेच गृहलक्ष्मी, वसुधा, आहेर, ऋतुपर्ण, सज्जनगड, माहेर, धनुर्धारी, जनस्वास्थ्यरक्षक, सुभाषित, आरती, पर्ण अशा विविध मासिकातून, दिवाळी अंकातून सातत्याने विनोदी लेख, कविता, प्रवासवर्णन तसेच इतर स्फुट लेखन.

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ “लेखनिका” – लेखक : डॉ. निशिकांत श्रोत्री ☆ परिचय – श्री दादासाहेब दापोलीकर (सुमंत जुवेकर)  ☆

पुस्तक : लेखनिका

लेखक – डॉ. निशिकांत श्रोत्री

प्रकाशक – बुकगंगा प्रकाशन

पृष्ठ संख्या – १५०   

मूल्य – ₹ ५९९ 

माझी लेखनिका: एका नवरसपूर्ण, वाचनीय आणि संग्राह्य कथासंग्रहाचे रसग्रहण!!

कथा ही आपल्या सभोवताली घडणाऱ्या घटनांचे, प्रसंगांचे सर्वसाधारणपणे अनुक्रमे केलेले परिणामकारक वर्णन असते. कथा म्हणजे नुसता प्रसंग नाही. कथा ही काही प्रसंगांची शृंखला असते. या शृंखलेमध्ये वाचकांना कथेच्या अंतापर्यंत बांधून ठेवण्याची, म्हणजे खिळवून ठेवण्याची शक्ती असेल तर ती कथा समर्थ म्हणायला हरकत नाही.

कथालेखकाला एखाद्या घटनेमध्ये कथाबीज सापडते. अचूक पात्रयोजना, परिणामकारी संवाद, अलंकार, म्हणी, कल्पनाशक्ती, प्रतिभाशक्ती, अनुभवाचा वापर करून सिद्धहस्त लेखक खिळवून ठेवणारी कथा जन्माला घालतो. अशा दहा वाचनीय कथांचा हा कथासंग्रह- ‘माझी लेखनिका’ या नावाने डॉ. निशिकांत श्रोत्री यांनी सादर केला आहें. महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे यातील अनेक कथांचा शेवट वाचकांच्या अनुभवानुसार करण्यास वाव दिला आहें… पुढे काय घडलं असेल? या धाटणीचा प्रश्न कथेच्या शेवटी लेखक वाचकांना विचारून त्यांच्या कल्पनाशक्तीला चालना देऊन तेथेच थांबतो. कथानायक प्रथम पुरुषात बोलल्याने हा आपल्याशीच बोलत आहे असे वाटून वाचक आनंद घेऊ शकतो.

संवाद सहजता, विविध प्रसंगातून पात्राचे व्यक्तिमत्व उभे करीत लेखक वाचकाच्या मनात प्रवेश करतो. शृंगार, करुण, हास्य वगैरे नवरसांपैकी विविध रसांचा परिपोष लेखनामध्ये आढळतो. लेखकाने या नवऱसांचा उपयोग लेखनसौंदर्य वाढवण्यासाठी सहजतेने केला आहे. माझी लेखनिका -यांत संयत शृंगार रस, मोल या कथेत करुण रस, अपूर्ण राहिलेली गोष्ट मध्ये अद्भुत रस, अशी नवरसवंती वाचकांवर वर्षाव करत राहते.

ह्या कथासंग्रहाचे मुखपृष्ठ बंगलोरच्या सुश्री अदिती नाईक यांनी काढले आहें. मोरपीस जसे तलम तंतूनी आकर्षक भासते. स्पर्श मुलायम असतो. त्याचा रंग, आकार मनाला मोहून टाकतो, तशा ह्या कथा लेखक, वाचक आणि त्यांचे अंतरंग यांत तलम धाग्याने एकरूप झाल्या आहेत. त्या मोरपीसाला झरणीचे रूप देऊन कथांचा श्रीगणेशा केला आहे. खूपच भावणारे, बोलणारे असे मुखपृष्ठ आहें.

१) माझी लेखनिका 

संवाद शैलीत लेखन असलेली ही कथा मनरूपी तरल भूमीचे द्योतक आहें. वाचकांसाठी असलेली भूमिका कथेतून स्पष्ट होते.

सौंदर्य माणसाच्या चेहऱ्यावर अवलंबून नसते.. आंतरिक सौंदर्य महत्वाचं. शारीरिक सौंदर्य कालांतराने संपुष्टात येतं. पण मानसिक सौंदर्य एकमेकांना जवळ आणतं. हाच प्रेमळ संदेश ही कथा आपल्याला देते. सध्याच्या तंत्रज्ञानाच्या युगात मनात उमललेली ही प्रेमकथा अधिक भावते. काहीशी दीर्घरुपात असणारी पहिलीच कथा वाचकांना उर्वरित कथेबद्दल उत्सुकता निर्माण केल्याविना राहणार नाही हे नक्कीच…

२) अपूर्ण राहिलेली गोष्ट..

विचार ही जन्मत:च मिळालेली देणगी असते. जसा विचार करतो तसे घडते असे म्हटले जाते. विचार दिसत नाहीत पण विचारांचा परिणाम दिसतो. जेव्हा कथालेखक मनात योजिलेली घटनांची क्रमवार मालिका मांडतो तेव्हा त्या घटनांशी एकरूप झालेला असतो. जेव्हा कथेत घडलेल्या घटनांचा प्रत्यक्ष अनुभव येतो. तेव्हा मात्र त्याची कथा अपूर्ण राहते की पूर्ण? कथेतली नायिका आणि प्रत्यक्ष वास्तवातील नायिका सुशीला या एकच आहेत का? याच प्रश्नांची उत्तरं या कथेअंती मिळतील.

३) मोल

आपलं आयुष्य निसर्गातील घटक म्हणजे झाडं, मुकी जनावरं, आसपासचा परिसर याच्याशी जोडलेलं असतं. त्यांच्याविना आयुष्याला अर्थ उरत नाही. त्यांच्यावर जीवापाड प्रेम करताना मनावर दगड ठेवून निर्णयही घ्यावे लागतात. तसंच काहीसं घडलं ‘मोल’ या कथेत. सोन्या आणि रुप्या दोन्ही जिराबताना पोटच्या पोराप्रमाणे सांभाळणारा मारुती, त्याला साथ देणारी पत्नी सुभद्रा. सतत तीन वर्षांच्या दुष्काळाने सर्वजण हतबल झाले असताना त्याची झळ मुक्या जनावरांनादेखील भोगावी लागत आहें. सध्याच्या काळात विस्मरणात जात असलेल्या शब्दांचा वापर आठवणीने केला आहें. उदा. जितराब. तसेच यात बोली भाषेत येणारे संवाद, म्हणी, वाक्प्रचार तसेच अनुप्रास अलंकाराचा अगदी सहजतेने केलेला वापर, ‘ते ढग जणू आकाशीची मृगजळेच ठरले होते’ अशी मनाचा ठाव घेणारी करुणामय वाक्यरचना अशी अनेक लेखन वैशिष्ट्ये यांत जाणवतात. म्हणूनच मोल ही कथा डोळयांत पाणी आणते….

४) मस्करी

‘मस्करी’ कथेची सुरुवातच उत्कंठावर्धक आहें. मित्र प्रकाशची दार उघडेपर्यंत कडी वाजविण्याची सवय माहित असल्याने कथानायक दार उघडण्यास उशीर करतो. परंतु प्रकाशचा भेदरलेला आवाज ऐकताक्षणी तातडीने दार उघडतो. त्या दोघांच्या संवादातून आदल्या दिवशी घडलेल्या पार्टीचा वृतांत समजतो. कथासूत्र लक्षात येतं असतानाच कथा अशा वळणावर येऊन ठेपते. त्यात वाचक हरवून जातो.

५) प्रामाणिक

‘प्रामाणिक’ कथेत निवेदन तंत्राचा उपयोग केला आहे. सुनिला, महेश आणि लता यांच्या प्रेमाचा त्रिकोण मनोगताच्या रूपाने वर्णिला आहें. मानवी मनाचा तळ अनेक भावनांच्या स्तराने व्यापला आहें. त्यात प्रेम ही सर्वात श्रेष्ठ भावना आहे. ह्याच पवित्र भावनेचा विकास सुनिला आणि महेश यांच्यात होत असताना लताने मात्र सुनिलाचा विश्वासघात केला. दोन जिवलग मैत्रिणी कायमच्या दुरावल्या आहेत. कोण कुणाशी प्रामाणिक राहतं? हे कथेच्या अंती समजते.

६) तोहफा

कथालेखक आपल्या कथेतून विनोदी, गंभीर, व्यंग्य अशा विभिन्न विषयास हाताळत असतो. असाच एक संवेदनशील विषय तोहफा या कथेत दिसून येतो. सुधा आणि सुलभा ह्या अल्लड स्वभावाच्या आहेत. त्यांना म्हणावी तेवढी समज नाही. सुधासोबत सुलभा हॉटेलचे खाण्यास सरावली आहें. त्याचवेळी सुधा एका मुलाच्या प्रेमात अडकली. त्याचा परिणाम म्हणून तिच्या घरच्यांनी विरोध केला की तिचे प्रेम मान्य केले? या संबंधाचा शेवट कसा झाला? सुलभाला या सर्वातून काय शिकायला मिळाले? यांची उत्तरे आपल्याला या कथेतून मिळतात. सामाजिक परिस्थितीशी संबंधित ही कथा मनाला विचारमय करते.

७) मी जिंकले, मी हरले

मी जिंकले, मी हरले ह्या कथेतील आई पराकोटींचा त्याग करते. खरेतर ही मायना नसलेल्या पत्ररूपात असलेली कथा म्हणजे त्या आईच्या मनाचं मोकळं होणं आहें. ‘जगात चांगली, भली माणसेसुद्धा खूप आहेत ग, फक्त त्यांच्याकडे शुद्ध नजरेने पहावयाची दृष्टी असावी लागते’ हा सुनेला दिलेला मोलाचा सल्ला किती महत्वाचा आहें हे संवादातून जाणवते. कथेच्या शेवटी ‘कुणीच कुणाची नसलेली मी’ यातून त्या कथेतील आईची कशातही अडकून न राहण्याची प्रवृत्ती सिद्ध होते.

८) बंद दार

डॉ. श्रोत्री यांची ‘बंद दार’ही कथा देखील वेगळ्या धाटणीची. बंद दाराआड लपलेले सौंदर्य नायकाच्या नजरेस पडते तेव्हा नायकाची होणारी मानसिक आंदोलने लेखकाने कल्पकतेने मांडली आहेत. लेखकांच्या मनोरम, उत्सुकतापूर्ण शैलीतील हेच दार वाचकांचे कुतूहल शमवते. म्हणूनच ही कथा तिच्या सौंदर्यासारखी मनात रेंगाळतं राहते..

९) गुरुकिल्ली

आपण दिवास्वप्नात अडकणारे आजूबाजूला पाहतो. झोपेत पडलेल्या स्वप्नाचा प्रत्यक्ष आयुष्याशी संबंध जोडणारा दिन्या थोडा विक्षिप्त आहें. मित्र बन्या आणि बायको मीना दोघेही दिन्याला प्रत्येकवेळी सावरून घेतात. इतकेच नव्हे तर दिन्याच्या साहेबालादेखील याची कल्पना देतात.

कथेच्या अखेरीस दिन्याला कोणता संदेश गुरूंकडून मिळतो, ज्यामुळे या कथेचे ‘गुरुकिल्ली ‘ हे शीर्षक सुसंगत ठरते.

१०) सूड

प्रेम ही मंगलमय भावना, तर सूड त्याविरोधी भावना. मनासारखे झाले नाही, फसवले गेलो आहोत अशी भावना मनात सूड निर्माण करते. अश्विन आणि दीपा ह्या दोन पात्रामार्फत लेखकांनी रंगविलेले प्रेमाचे दोन आयाम सूड कथेत वाचायला मिळतात.

डॉ श्रोत्री यांनी वयाच्या ८० व्या वर्षीदेखील लेखन जगतात दाखविलेला उत्साह स्तिमित करणारा आहें. वैद्यक व्यवसायामध्ये एमडी डीजी ओ आणि अशा अनेक पदव्या धारण करणारे डॉक्टर श्रोत्री साहित्याच्या प्रांतातही सहजतेने मुसाफिरी करतात. भगवद्गीता, वेद, शास्त्रे, पुराणे, उपनिषदे यांचा सखोल अभ्यास त्यांनी केलेला आहे. लेखनामध्ये हा प्रभाव सतत जाणवत राहतो..

एका छोट्याशा घटनेतून प्रतिभावंत लेखकाच्या मनामध्ये कथेचे बीच हळूहळू अंकुरते. त्यावर लेखक कल्पना, प्रतिभा आणि शब्दलक्ष्मीचे संस्कार करून त्या कथेचा विकास करतो. कथाबीजातून अशाप्रकारे जन्मणाऱ्या कथेमध्ये येत जात राहणारी पात्रे, त्यांचे मनोव्यापार, संबंधित घटनाची विलक्षण गुंफण करून लेखक वाचकांच्या मनावर अपेक्षित परिणाम करतो. यशस्वी कथेची ही सारी सूत्रे डॉ. श्रोत्री यांच्या कथेतून दृष्टोत्पत्तीस येतात.. रसिक वाचकांनी या कथासंग्रहाचा अवश्य रसास्वाद घ्यावा.

परिचय : श्री दादासाहेब दापोलीकर (सुमंत जुवेकर) 

https://dadasahebdapolikar. wordpress. com या ब्लॉगवर वाचनासाठी उपलब्ध आहें.

संपर्क – ९९६७८४०००५ ईमेल – dadasahebdapolikar@gmail. com 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ “आनंदाच्या वाटेवर” – लेखिका : सौ ज्योत्स्ना तानवडे ☆ परिचय – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

?पुस्तकावर बोलू काही?

☆ “आनंदाच्या वाटेवर” – लेखिका : सौ ज्योत्स्ना तानवडे ☆ परिचय – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

पुस्तक : आनंदाच्या वाटेवर 

लेखिका : सौ ज्योत्स्ना तानवडे

 ९४२३४००४९२

प्रकाशक : अमित प्रकाशन

पुणे ०२०-२५६६०५६६

मूल्य : रु. ३५०/

सौ ज्योत्स्ना तानवडे

संपन्न जीवनाचा मार्ग—आनंदाच्या वाटेवर

‘आनंदाच्या वाटेवर ‘ हा सौ. ज्योत्स्ना तानवडे यांचा ललित लेख संग्रह! . एकंदर पस्तीस लेखांचा हा संग्रह संपूर्ण वाचनानंतर मनाला आनंद देऊन जातो. वेळोवेळी वेगवेगळ्या विषयांवर लिहिलेले लेख असले तरी प्रामुख्याने एक गोष्ट जाणवते. ती म्हणजे हे लेख प्रामुख्याने कुटुंबसंस्था, पर्यावरण आणि सामाजिक बांधिलकी या तीन मुख्य विषयांशी निगडित आहेत. या तीनही विषयात सौ. तानवडे यांना स्वारस्य असल्यामुळे व उक्ती आणि कृती यांची सांगड असल्यामुळे लिखाणात कृत्रिमपणा जाणवत नाही. परंपरा आणि विज्ञान यांची सांगड घालून समाजभान असणा-या चिंतनशील मनाचे लेखन असेच या संग्रहाविषयी म्हणावे लागेल.

प्रत्येक लेखाची योग्य ती दखल घेतल्याशिवाय पुढे वाचत जाणे उचित ठरणार नाही. म्हणून वाचताना लेखांविषयी जे वाटले ते असे -:

चला हसू या – माणसं जोडण्याचा सोपा मार्ग म्हणजे आपलं हास्य. आपल्याजवळचा हा ठेवा इतरांसाठी वापरून आपण आपला आनंद कसा वाढवू शकतो हे सांगणारा लेख.

आनंदाचा झरा कुटुंबातील एकोप्याची भावना हाच कुटुंबाच्या आनंदाचा खरा झरा आहे. दुस-यांच्या आयुष्यात आनंद फुलवताना आपल्या कुटुंबातील आनंदाचा झरा अधिक प्रवाहित होत जातो आणि तो पुढच्या पिढ्यांनाही समृद्ध बनवतो. म्हणून ‘ मनाची मनाशी मैत्री ‘ जोडणे आवश्यक आहे असे लेखिका आवर्जून सांगतात.

रेशीमगाठी – कशाच्या आहेत या रेशीमगाठी? या रेशीमगाठी आहेत नात्यांच्या. भारतीय समाजातील एकत्र कुटुंब पद्धती कडून विभक्त आणि त्याहीपुढे एकल कुटुंब पद्धतीकडे होणारी वाटचाल हा चिंतेचा विषय आहे. पण त्यातून मार्ग कसा काढायचा यांचा कानमंत्र देणारा हा लेख.

गंध नात्यांचा गहिरा – काव्य पंक्तींची पेरणी करत स्नेहाच्या बंधनातून निर्माण झालेल्या नात्यांचा गंध किती गहिरा असतो हे दाखवताना लेखिकेने या लेखात सर्व नात्यांची आठवणीने दखल घेतली आहे. सगळी नाती जपायची असतील तर नेमकं काय केलं पाहिजे, आनंदाचं गुपीत काय आहे हे कळण्यासाठी लेखच वाचायला हवा.

अमृत भरारी – भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त लिहीलेल्या या लेखात लेखिकेच्या मनात आपल्या देशाविषयी असलेले प्रेम, अभिमान आणि उज्वल भविष्याची तळमळ स्पष्टपणे दिसून येते. लेखाच्या प्रारंभीच त्यांनी तिरंगा ध्वजाचे त्यांनी केलेले वर्णन विचारांचे वेगळेपण दाखवून देते. हक्क आणि कर्तव्य दोन्ही समजून घेऊन सजग नागरिकाचे वर्तन कसे असावे याविषयीही त्यांनी लिहीले आहे.

आदर्श मंत्र –आरोग्याचा जागर करणारा हा लेख. निरोगी शरीर हा सुखी आयुष्याचा पाया आहे. पण शरीर निरोगी राखण्यासाठी आवश्यक असणारी जागरुकता मात्र दिसून येत नाही. प्रत्येकाने आपल्या व कुटुंबाच्या आरोग्याची आजार होण्यापूर्वीच काळजी घ्यावी असे त्यांनी आवर्जून सांगितले आहे.

सखासोबती निसर्ग – माणसाचे आणि निसर्गाचे नाते अतूट आहे. आधुनिक जगात पर्यावरणाचा तोल ढासळत असला तरी माणसाची निसर्गाविषयीची ओढ काही कमी होत नाही. माणूस निसर्गाशी कसा जोडला गेला आहे, हे सांगणारा हा लेख आहे.

पुढचे पाऊल – काळाचे पुढचे पाऊल म्हणजे उगवणारे नवे वर्ष! सरत्या वर्षाचा ताळेबंद मांडून नव्या वर्षाचे स्वागत करताना आठवणी आणि अनुभव यांची पुंजी बरोबर घेऊन पुढे जायचे असते. प्रत्येक नव्या वर्षात, वैयक्तिक प्रगती बरोबरच कौटुंबिक आणि पर्यायाने सामाजिक प्रगती कशी साधता येईल याचा विचार झाला पाहिजे असा नवा दृष्टिकोन त्यांनी आपल्या समोर ठेवला आहे.

विसाव्याचा थांबा – सतत कोणत्या ना कोणत्या कामात व्यग्र असण-या माणसाच्या फक्त शरीराला नव्हे तर मनालाही विश्रांती हवी असते. असं थोडंसं थांबून ताजतवानं होण्यासाठी रोजच्या जगापासून दूर जावं असं सगळ्वायांनाच वाटत असतं. हा निवांतपणा पाहिजे असेल तर एखाद्या छोट्या पण सुरक्षित ठिकाणी, निसर्गाच्या सान्निध्यात जाणं यासारखं सुख नाही. आपल्या कुटुंबायां समवेत अशी विश्रांती घेणं म्हणजे मनाला उभारी देणं असतं. अशा ‘ आफ्टर द ब्रेक ‘ नंतर आपण पुन्हा नव्या जोमाने आपल्या रोजच्या जीवनात उत्साहाने रमून जाऊ शकतो.

सुख येई जळासवे – जल हेच जीवन हे सर्वांना माहित असलं तरी या ‘ जीवना ‘ कडं आपण कसे पाहतो हे दाखवून देणारा हा लेख. पाणी प्रश्नाचा सर्व बाजूंनी विचार करुन काही उत्तरेही लेखिकेने सांगून ठेवली आहेत. भूजल म्हणजे आपल्या सर्वांची जमिनीखालची पाण्याची टाकी ही उपमा खूपच समर्पक आहे.

सेल्फी पॉइंट –शिर्षकावरुन लेखाचा विषय लक्षात येत नाही. निसर्ग प्रेम व संवर्धन हा विषय यात हाताळलाय.

स्वतःच्या बागेतील वृक्षच वसुधाशी बोलू लागतात ही कल्पना खूप काव्यात्मक आहे.

दुस-यासाठी जगलात – जगलो खूप. पण कुणासाठी?

ते सर्वात महत्त्वाचे आहे. केवळ दीर्घायुषी होण्यापेक्षा आपलं जगणं इतरांसाठी, समाजासाठी कारणी लावणं जास्त महत्त्वाचं आहे.

सुखाचे हे सुख – सुख म्हणजे नेमके काय आणि ते कसे मिळवायचे असते या प्रश्नाच्या उत्तरावर केलेले मुक्त चिंतन म्हणजे हा लेख. साध्या साध्या गोष्टींतूनही सुख कसे मिळते ते समजून घेण्यासारखे आहे.. प्रत्येक घटनेला दोन बाजू असतात. आपण सुखाचा एक धागा शोधायचा की दु:खाच्या शंभर धाग्यात गुरफटून जायचं हे आपल्या दृष्टीवर अवलंबून आहे.

यज्ञकर्म – खाणे हा विषयच सर्वांच्या जिव्हाळ्याचा! घरचे खाणे आणि बाहेरचे खाणे हा खूप चर्चेचा विषय.

आजच्या जीवन पद्धतीमुळे बाहेरचे खाणे टाळता येत नसल्यामुळे कोणती काळजी किंवा दक्षता घेतली पाहिजे ते लेखिकेने सांगितले आहे. पण त्याहीपेक्षा घरचे पदार्थ चांगले का हे त्यांनी पटवून दिले आहे.

फिक्स्ड डिपॉझिट – माणसं जोडत गेलं की आपल्याला शुभेच्छा आणि शुभाशिर्वाद यांची ठेव मिळत जाते. ही आयुष्यभराची ठेव आपल्याला जगण्यासाठी 

उर्जा देते. आपणही अशी ठेव दुस-याला द्यावी आणि मनाची श्रीमंती वाढवावी असं सांगणारा हा लेख.

लुटू या प्रेमाचा खजिना – संक्रांत सणाला हळदीकुंकूवाच्या निमित्ताने काही ना काही लुटण्याची पद्धत आहे. काळानुसार लुटण्याचा वस्तूही बदलल्या. मग आणखी थोडा बदल करून प्रेम, आपुलकी का लुटू नये?

शिवाय गरजू व्यक्ती किंवा संस्थांना उपयुक्त वस्तूही लुटता येतील. असा नवा विचार या लेखात मांडला आहे.

उजळू आपुली नाती – सणांच्या निमित्ताने एकत्र येणे हे नात्यांना टिकवून ठेवण्यासाठी, उजाळा देण्यासाठी उत्तम माध्यम आहे. शिवाय अशा एकत्र येण्यामुळे कुटुंबातील सदस्यांना एक व्यासपीठ मिळते आणि त्यातून कलागुणांना वाव मिळतो.

झुळझुळे कलेची सरिता – प्रत्येक माणसाच्या अंगी कोणती ना कोणती कला असतेच. आपण त्याचा शोध घेत नाही. पण तो घेतलाच पाहिजे. कारण कला आपल्या बरोबरच दुस-यांनाही आनंदी बनवते, समाधान देते. आपल्या शेवटापर्यंत साथ देणारी ही कला खरोखरच आपला मित्र असते. कलेची महती आणि तिचे महत्वाचे स्थान विषद करणारा हा लेख.

नात्यांचा गुंफू गोफ – आपल्या काळातील बालपण आणि आजच्या मुलांचे बालपण यात खूप फरक पडला आहे. तरीही कुटुंबातील मुले एकत्र आलीच पाहिजेत. त्याशिवाय पुढच्या पिढीपर्यंत नाती टिकणार नाहीत. यावर कोणता पर्याय काढला आहे ते लेख वाचल्यावरच समजेल.

आजीचा अकाऊंट – आजीचा अकाऊंट कोणत्याच बॅंकेत नाही याचं नातवाला आश्चर्य वाटतं. पण आजीच्या माणुसकीच्या खात्यातील जोडलेल्या नात्यांची भरगच्च ठेव पाहून तो थक्क होतो. कशी वाढवायची ही ठेव? लेख वाचला की आपोआपच समजेल.

गंगाजळी – पाण्याची गंगाजळी कायम शिल्लक राहण्यासाठी काय केलं पाहिजे हे सांगणारा हा लेख. पाण्याचे महत्व, आपली बेफिकीर वृत्ती, भावी पिढ्यांच्या विचार, जलसंपदेचे जतन आणि संवर्धन अशा विविध मुद्यांवर प्रकाश हा लेख प्रकाश टाकतो.

तू आहेस खास – स्त्रीला तिच्या स्त्रीत्वाची जाणीव करून देणारा लेख. आरसा समोर ठेवून स्वतःच्या प्रतिबिंबाशी संवाद साधण्याचा एक यशस्वी प्रयत्न.

जाता जाता, ‘ज्या वेदनांचे फळ आनंददायी असते त्या वेदनांचे दु:ख कधी करायचे नसते’ असा संदेश ही त्यांनी अगदी सहजपणे दिला आहे.

ऐका गणेशा तुमची कहाणी – असे म्हटले असले तरी या निमित्ताने लेखिकेने माणसाचीच कहाणी सांगितली आहे. पर्यावरण विषयक त्याने केलेल्या चुका त्यांच्या गळी उतरवून, झालेल्या चुकांची पुनरावृत्ती होणार नाही, उलट

वागण्यात सुधारणाच होईल असेही त्यांच्याकडून वदवून घेतले आहे.

स्फूर्ती देवता ‌- आपले व्यक्तिमत्व घडवण्यामध्ये आपल्या आईवडीलांचा सिंहांचा वाटा असतो. लेखिकेने या लेखात आपले आईवडील याच आपल्या स्फूर्ती देवता कशा आहेत ते अगदी मनापासून सांगितले आहे. आईवडीलांविषयी त्यांच्या मनात असणारी श्रद्धा, प्रेम व आदर प्रत्येक वाक्यातून दिसून येतो. खूप आत्मियतेने केलेले व्यक्तीचित्रण!

अनुभूति – धावपळीच्या जीवनात मनाला श्रांत करण्यासाठी थोडी विश्रांती घेणे आणि त्यासाठी निसर्गाशी जवळीक साधते यासारखा उत्तम मार्ग नाही. पंचतत्वांच्या सहवासात मिळणारा अलौकिक आनंद हा प्रत्यक्ष अनुभूती घेतल्याशिवाय समजणारच  नाही.

फिरुनी उगमाकडे – कान्हा या पात्राभोवती थोडेसे कथानक रंगवून, संवादातून नदी स्वच्छता मोहीमेचे महत्त्व या लेखातून सांगितले आहे. जल जागृती साठी असे संवादात्मक लेख नक्कीच उपयोगी ठरतील.

वरदहस्त – आस्तिक की नास्तिक? लेखिकेने सुरुवातीलाच सांगितले आहे की आपले कुटुंब हे पूर्णपणे आस्तिक आहे. पण ही श्रद्धा डोळस आहे. सद्वर्तन आणि सदाचार यावर भर देणारी आहे. पेराल तसे उगवेल हा नियम अंगी बाणणारी आहे. आपल्या आयुष्यातील महत्त्वाच्या दोन तीन प्रसंगांचा दाखला देऊन त्यांनी ‘ त्याचा ‘ वरदहस्त केव्हा आणि कसा मिळतो हे दाखवून दिले आहे.

तमसो मा ज्योतीर्गमय – अंधत्वाची कारणे, नेत्रदानाचे महत्व, त्याविषयी असणारे गैरसमज, नेत्रदान करण्याची पद्धत अशा विविध मुद्यांवर चर्चा करुन ‘ मरावे परी नेत्ररुपी उरावे ‘ असा संदेश देणार हा माहितीपूर्ण लेख महत्वाचा वाटतो.

खुलभर दूध – आपल्या पारंपारिक किंवा धार्मिक गोष्टींतून खूप मोठा संदेश दिलेला असतो. सोमवारची कहाणी

प्रथम कथन करुन पुढे लेखिकेने सत्पात्री दान, परोपकार, समाजसेवा, समाधानी वृत्ती, यांचे महत्त्व समजावून दिले आहे.

नि‌सर्ग आपला गुरु – बिनभिंतीच्या शाळेमध्ये डोळे आणि कान उघडे ठेवून शिकायचे असेल तर निसर्गासारखा गुरू नाही. निसर्ग काय काय शिकवतो, त्यांच्याकडून कसं शिकता येईल, याच विवेचन करत करत निसर्गाप्रमाणे आपणही दुस-यांच्या आयुष्यात आनंद फुलवू शकतो असा विश्वास लेखिकेने व्यक्त केला आहे.

दीप नव्या जाणिवांचे – दीपावलीला सुरु होणा-या नववर्षाच्या निमित्ताने स्वतःच्या अंतरंगातील दीप उजळावेत ही जाणीव करून देणारा हा लेख. मौजमजा, झगमगाट, लखलखाट याबरोबरच सरलेल्या वर्षांचा आढावा घेऊन नव्या वर्षात वैयक्तिक प्रगती बरोबरच सामाजिक जबाबदारी कशी पेलावी हे या लेखातून सुचवले आहे.

मला भावलेला श्रीकृष्ण – कोणताही मोह नसलेला पण सर्वांना मोहवून टाकणारा, तो मनमोहन! त्यांच्याशी साधलेला हा संवाद. तो आपल्याला का भावला हे सांगून शेवटी पुन्हा एकदा ‘ धर्म संस्थापना ‘ व्हावी अशी अपेक्षा लेखिकेने व्यक्त केली आहे.

फॅमिली डॉक्टर – फॅमिली डॉक्टर ही संकल्पना कालबाह्य झाली आहे. पण बदललेल्या सामाजिक परिस्थितीमुळे कुटुंबे एकाकी पडत चालली आहेत. वेगाच्या या युगात डॉक्टरनाही थांबायला सवड नाही अशी अवस्था आहे. त्यामुळे आता परत एकदा फॉमिली डॉक्टर ची आवश्यकता आहे असे लेखिकेला वाटते.

अवघे धरू सुपंथ – सामाजिक परिस्थिती व त्यातून निर्माण होणारे प्रश्न यावर आपण नियंत्रण ठेवू शकत नाही. पण मार्ग मात्र काढू शकतो. त्यासाठीच परस्पर सहकार्याचा मार्ग लेखिकेने दाखवून दिला आहे. परस्पर सहकार्यामुळे बलवान समाजाची निर्मिती होऊ शकते.

असा पस्तीस लेखांचा हा संग्रह अथ पासून इति पर्यंत वाचनीय. सोप्या भाषेत, मोकळेपणाने कसे लिहावे हे या पुस्तकाच्या वाचनामुळे समजू शकेल. असेच आणखी लिहीत रहावे यासाठी सौ. ज्योत्स्ना तानवडे यांना हार्दिक शुभेच्छा!

पुस्तक परिचय – श्री सुहास रघुनाथ पंडित

सांगली (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ “इंडियाज मोस्ट फिअरलेस.. – भाग १, २, ३ ” – एकत्रित लेखक : शिव अरुर आणि राहुल सिंह ☆ परिचय –  श्री हर्षल सुरेश भानुशाली☆

श्री हर्षल सुरेश भानुशाली

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ “इंडियाज मोस्ट फिअरलेस.. – भाग १, २, ३ ” – एकत्रित लेखक : शिव अरुर आणि राहुल सिंह ☆ परिचय –  श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆

पुस्तक : इंडियाज मोस्ट फिअरलेस – भाग १, २, ३

भारतीय लष्करी दलांमधील शौर्याच्या सत्यकथा

तीन भागात – एकत्र उपलब्ध

लेखक – शिव अरूर आणि राहुल सिंह

मूल्य : १२३०₹ सवलत मूल्य १०४०₹ 

 

भाग १) एल. ओ. सी. च्या पलीकडे जाऊन सप्टेंबर 2016मध्ये पाकिस्तानी अतिरेक्यांच्या ठाण्यांवरच्या यशस्वी हल्ल्याचे नेतृत्व करणारे मेजर

पृष्ठ: ३१५

मूल्य: ३५०₹

11 दिवसांत 10 अतिरेक्यांना ठार मारणारा सैनिक, कुठल्याही क्षणी युद्ध सुरू होणाऱ्या भूमीवरून शेकडो लोकांची सुटका करण्यासाठी, भयावह वातावरणातल्या बंदरावर जहाज घेऊन जाणारे नौदलातले अधिकारी आणि रक्तबंबाळ स्थितीतही जळतं जेट विमान चालवणारा हवाई दलाचा पायलट !

– – ह्या सगळ्यांच्या शौर्याचा कस लावणाऱ्या घटनांचं हे कथन ! काही त्यात प्रत्यक्ष सहभागी असणाऱ्यांनी दिलेल्या माहितीवर आधारित, तर काही यांच्याबरोबरच्या मोहिमेत त्यांना अखेरपर्यंत साथ देणाऱ्या इतरांनी सांगितलेल्या माहितीवर आधारलेल्या, अशा ह्या कथा !

‘इंडियाज मोस्ट फिअरलेस’ हे पुस्तक असामान्य शौर्य आणि कमालीची निर्भयता, ह्यांचं दर्शन वाचकांना घडवतं. अत्यंत विपरीत परिस्थितीत आणि गंभीर आव्हानं समोर असतानाही, भारताच्या ह्या शूरवीरांनी ज्या धाडसाने त्यांच्यावर मात केली आहे, त्याच्या खिळवून ठेवणार्या हकिगती लेखकांनी ह्यात पुस्तकातून वाचकांपुढे ठेवल्या आहेत.

 

भाग 2) दहशतवादविरोधातील लक्षणीय मोहिमांच्या आजवर कुणीही न सांगितलेल्या हकिगती

पृष्ठ: ३३६

मूल्य: ४६०₹

2016 सालच्या सर्जिकल स्ट्राइक्सच्या पार्श्वभूमीवर झालेल्या दहशतवादविरोधी चकमकींचे खिळवून ठेवणारे प्रत्यक्षदर्शी वृत्तान्त; 

काश्मीरमधल्या भरदिवसा रात्रीसारख्या भासणाऱ्या विलक्षण जंगलांमधून दहशतवाद्यांचा पाठलाग करणारे सैनिक; 

पाणबुडीवरच्या संपूर्ण क्रूला वाचवण्यासाठी आपल्या सर्वस्वाची आहुती देणारी तरुण नौदल अधिकाऱ्यांची जोडगोळी; 

आपल्या सोबत्यांच्या मृत्यूचा सूड उगवत नाही तोपर्यंत झोपूही न शकलेला हवाईदलातला एक कमांडो; 

पाकिस्तानी दहशतवाद्यांवर स्पेशल फोर्सेसने केलेल्या भीषण हल्ल्यामध्ये आत्मा शांत करणारा आयकर खात्यातला एक ‘बाबू’ आणि अशा अनेक कथा.

– – त्यांच्या कथा, त्यांच्यात शब्दांत किंवा त्यांच्या अखेरच्या क्षणी त्यांना सोबत करणाऱ्यांच्या शब्दांत.

‘इंडियाज मोस्ट फिअरलेस’च्या बहुप्रतिक्षित दुसऱ्या भागात थक्क करून सोडणाऱ्या निर्भयतेचं आणि भारतीय सैन्यदलाने कर्तव्य बजावताना दाखवलेल्या अतुलनीय धैर्याचं अत्यंत जवळून दर्शन घडवणाऱ्या या कथा वाचल्याच पाहिजेत.

‘सैन्यदलाच्या धुरंधर कामगिरीचा खराखुरा आत्मा अगदी बारीक तपशिलांसह टिपण्याची कामगिरी ‘इंडियाज मोस्ट फिअरलेस’ने पुन्हा एकदा करून दाखवली आहे. ’

– – कै. जनरल बिपिन रावत, माजी सैन्यदल प्रमुख

 

भाग 3) एक लष्करी वैद्यकीय साहाय्यक आपल्या कर्तव्याच्या आवाहनापलीकडे जात दोन्हीकडच्या सैनिकांना वैद्यकीय उपचार देण्याचा प्रयत्न करतो.

पृष्ठ: ३०४

मूल्य: ४२०₹

— लडाखच्या गलवान खोऱ्यातील दगाबाज रक्तपाताच्या गोंधळात आपले सहकारी सैनिक चीन सैन्याशी जीवन-मरणाची लढाई करत असताना एक लष्करी वैद्यकीय साहाय्यक आपल्या कर्तव्याच्या आवाहनापलीकडे जात दोन्हीकडच्या सैनिकांना वैद्यकीय उपचार देण्याचा प्रयत्न करतो.

— अरबी समुद्रात आलेल्या तौक्ते या चक्रीवादळातून शेकडो लोकांचे जीव वाचवण्यासाठी भारतीय नौदलाच्या युद्धनौकेवरील कर्मचारी आपले सर्वस्व पणाला लावतात.

— भारतीय हवाई दलाचा एक वैमानिक आपले अपघातग्रस्त लढाऊ विमान जमिनीवर कोसळण्याच्या दोन सेकंद आधी विमानातून बाहेर उडी टाकतो आणि आपला जीव वाचवतो मात्र एक पाय गमावतो.

– – या पुस्तकात वरील साऱ्यांची अथवा त्यांच्या शेवटच्या क्षणी त्यांच्याबरोबर असणाऱ्यांची कथने नमूद आहेत.

‘इंडियाज मोस्ट फिअरलेस 3 या पुस्तकात असाधारण धाडसाच्या आणि निर्भयतेच्या 10 सच्च्या कथा वर्णन केल्या आहेत. अकल्पनीय अशा प्रतिकूल परिस्थितीला आणि गंभीर चिथावणीला सामोरे जाताना या भारतीय सैनिकांनी दाखवलेल्या बहादुरीची, वीरश्रीची झलक या कथांमधून पाहायला मिळते.

– – भारताच्या शूरवीरांची खरी कहाणी – रणांगणातली, रक्तात न्हालेली, पण अभिमानाने झळकणारी !”

‘इंडियाज मोस्ट फिअरलेस भाग १, २, ३ ’ ही केवळ पुस्तक मालिका नाही, तर ती आहे भारतीय जवानांच्या असामान्य शौर्याची साक्ष.

* पुलवामा, बालाकोट, गलवान — जिथे शब्द संपतात, तिथून भारतीय सैनिकांचं शौर्य सुरू होतं. “

भारताच्या सैनिकी इतिहासातील हे क्षण केवळ घटना नव्हेत, तर शौर्याच्या त्या जळत्या मशाली आहेत ज्या पिढ्यान्‌पिढ्यांना प्रेरणा देतील.

— पुलवामामध्ये ४० जवानांचा बलिदान भारताच्या हृदयावर कोरलं गेलं.

— त्याच्या प्रत्युत्तरात आलेली बालाकोट एअर स्ट्राइक — शत्रूच्या हृदयात घुसून दिलेला धगधगता संदेश.

— गलवान खोऱ्यात, शस्त्रांशिवाय, हातघाईत लढत आपल्या साथींना वाचवण्यासाठी उभं राहिलेलं भारतीय सैन्य — जिथे रक्ताचा प्रत्येक थेंब मातीसाठी वाहिला गेला.

‘इंडियाज मोस्ट फिअरलेस’ ही त्या रणधुरंधरांची सत्यकथा आहे — जे केवळ लढले नाहीत, तर मृत्यूलाही डोळ्यात डोळे घालून भिडले.

या कथा प्रत्यक्ष मोहिमांमध्ये सहभागी असलेल्या जवानांच्या शब्दांत आहेत – तपशीलवार, थरारक आणि काळजाला भिडणाऱ्या कथा — त्यांच्या जीवावर आपापल्या घरात सुरक्षितपणे आणि निवांत जगणाऱ्या प्रत्येक भारतीयाने ज्या आदरपूर्वक वाचल्याच पाहिजेत अशा कथा.

परिचय : श्री हर्षल सुरेश भानुशाली

पालघर 

मो. 9619800030

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares