मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ रणरागिणी ‘दीपिका अधाना’ – माहिती संग्राहक : अज्ञात ☆ प्रस्तुती – अंजली दिलीप गोखले ☆

अंजली दिलीप गोखले

? इंद्रधनुष्य ?

☆ रणरागिणी ‘दीपिका अधाना’ – माहिती संग्राहक : अज्ञात ☆ प्रस्तुती – अंजली दिलीप गोखले

“कर्तव्यापुढे मृत्यूची भीतीही फिकी पडते!” हरियाणातील फरीदाबादच्या २३ वर्षीय वैमानिक दीपिका अधाना हिने अटीतटीच्या प्रसंगात दाखवलेले धैर्य आज संपूर्ण देशासाठी प्रेरणा ठरत आहे. युएई (UAE) मधून १६९ भारतीयांना सुखरूप मायदेशी आणण्याची जबाबदारी जेव्हा तिच्यावर आली, तेव्हा परिस्थिती अत्यंत भयानक होती.

मोहिमेवर निघण्यापूर्वी दीपिकाने आपल्या कुटुंबाला फोन केला आणि ती भावनिक होऊन म्हणाली, “आई, काका… कदाचित मी पुन्हा दिसणार नाही, मला शेवटचं बघून घ्या. ” पण तिच्या कुटुंबाने खचून न जाता तिला लढण्याचं बळ दिलं!

या ऐतिहासिक उड्डाणाचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे विमानातील सहाही क्रू मेंबर्स महिला होत्या. कॅप्टनपासून ते क्रू सदस्यांपर्यंत सर्वांनीच या संकटात पोलादी जिद्द दाखवली. मानाचा मुजरा!

एटीसीशी संपर्क तुटला अन… : उड्डाणादरम्यान काही काळ एटीसीशी (ATC) संपर्क तुटल्याने सर्वांचाच श्वास रोखला गेला होता. मात्र, दीपिकाने डगमगता विमान नियंत्रित केलं आणि अवघ्या एका तासात सर्व प्रवाशांना घेऊन दिल्ली गाठली.

जेव्हा विमान दिल्लीच्या विमानतळावर उतरलं, तेव्हा प्रवाशांच्या डोळ्यांत आनंदाश्रू होते. १६९ भारतीयांसाठी दीपिका आणि तिची टीम साक्षात ‘देवदूत’ बनून आली होती.

२३ वर्ष हे वय खेळण्या-बागडण्याचं असतं, पण दीपिकाने या वयात मृत्यूला डोळ्यांत डोळे घालून आव्हान दिलं. हीच खरी ‘नारीशक्ती’ आहे!

“स्वतःच्या प्राणाची पर्वा न करता १६९ भारतीयांचे प्राण वाचवणाऱ्या या वाघिणीचा – दीपिका अधानाचा हा पराक्रम घराघरात पोहोचवण्यासाठी पोस्ट शेअर करा! ” 

माहिती संग्राहक : अज्ञात 

प्रस्तुती : अंजली दिलीप गोखले 

मोबाईल नंबर 8482939011

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ श्री रविंद्रनाथ टागोर यांची “गीतांजली”… भाग – १६ ☆ सौ.मंजिरी येडूरकर ☆

श्री मंजिरी येडूरकर

? इंद्रधनुष्य ?

☆ श्री रविंद्रनाथ टागोर यांची “गीतांजली”… भाग – १६ ☆ श्री मंजिरी येडूरकर ☆

श्री रविंद्रनाथ टागोर

रविंद्रनाथ टागोरांच्या इंग्रजी गीतांजलीला सुप्रसिद्ध आयरिश कवी विल्यम बटलर यीट्स यांची प्रदीर्घ प्रस्तावना लाभली आहे. या कवितांनी त्यांना भारावून टाकलं आहे. या कवितांचा आधारभूत पाया म्हणजे प्राचीन भारतीय अध्यात्मिक तत्वज्ञान, त्यातील साधेपणा, भाबडेपणा, खरेपणा, पारदर्शकता, स्वयं मूल्यांकन करण्याचा धीटपणा, निरपेक्ष समर्पणाची भावना यांच्या कवितेतून होणाऱ्या दर्शनाने ते स्तिमित झाले आहेत. टागोरांच्या कवितांचा गर्भितार्थ, त्यातील तत्वज्ञान त्यांच्या मनाला भिडलं आहे. म्हणूनच त्यांनी एवढी प्रदीर्घ प्रस्तावना लिहिली असावी. यीट्स यांना देखील सन १९२३ मध्ये साहित्यासाठीचा नोबेल पुरस्कार मिळाला आहे. 

केवळ गीतांजलीतील कविताच नाही तर रविंद्रनाथांच्या पूर्ण आयुष्याच्या दर्शनाने यीट्स भारावून गेले आहेत. टागोरांच्या आयुष्याबद्दल च्या कल्पना, आयुष्याबद्दलचा दृष्टीकोन त्यांना अद्भुत वाटतो. 

त्यांच्या मते रविंद्रनाथांचे वडील, भाऊ व इतर कुटुंबीय देखील असाधारण होते. भारतीय तत्वज्ञानाची अध्यात्मिक बैठक, शतकानुशतके चालत आलेला भक्तिमार्ग, बंगालचे साहित्य आणि कलेमध्ये रमलेले जनजीवन या सर्वांचे सार म्हणजे गीतांजली, असे त्यांना वाटते. 

तासनतास निसर्गाकडे बघत राहणे, जगण्याचे, व्यवहाराचे भान विसरणे हे रविंद्रनाथांच्या असामान्य असण्याचे दाखले आहेत असं त्यांचं मत आहे. 

विश्वविधात्याबद्दलच्या टागोरांच्या भावना निर्व्याज आहेत. त्यांना कसलाही राजकीय वा सामाजिक गंध नाही असं यीट्सना खात्रीपूर्वक वाटतं आणि यामुळेच ते युरोपियन तत्वज्ञांपेक्षा वेगळे आहेत असं ते म्हणतात. 

ते म्हणतात की, गीतांजलीची खरी थोरवी, तिच्या साधेपणात आहे. मोजके शब्द, खऱ्या भावना आणि स्वतःच्या मनात डोकावून घेतलेला हा चैतन्याचा शोध आहे. रविंद्रनाथ कवी म्हणून कसे उमलत गेले याबद्दल लिहितांना ते म्हणतात, ” वयाच्या १५ ते २० वर्षे या कालावधीतील त्यांच्या कविता साध्या, सोप्या व जास्त करून निसर्गाविषयी आहेत. वयाच्या २५ ते ३५ वर्षे या टप्प्यामधील कविता प्रेम आणि शोक या दोन मूलभूत भावनांविषयी भाष्य करतात आणि त्यानंतरच्या काळात ते हळूहळू अध्यात्माकडे वळतात.” 

कोणताही हेतू मनात न धरता टागोरांनी त्या त्या वेळच्या आपल्या सच्च्या भावनांना शब्दरूप दिलं आहे. त्यावेळी हे पुस्तक कोण वाचेल, कोण त्याचा अभ्यास करेल, त्याचा परिणाम काय होईल असे कोणतेही विचार त्यांच्या मनात नव्हते. यीट्सना रविंद्रनाथ एखाद्या निरागस बालकासारखे वाटत. कोणत्याही लौकिक गोष्टींनी, विचारांनी त्यांना बंदिस्त केलेले नव्हतं. 

‘देव काय आहे’ या प्रश्नाचे उत्तर आपल्याला या कवितांमधून खूप सोप्या प्रकारे मिळतं. वर्षानुवर्षे हा प्रश्न आपल्याला पडलेला असतो पण टागोरांच्या कविता वाचून आपल्याला समजतं की इतकी वर्षे देव आपल्या मधेच होता, फक्त आपल्याला ते माहित नव्हतं. आपल्या सगळ्या शुद्ध भावना म्हणजेच देवत्व म्हणजेच देव. हे मान्य करण्यासाठी लागणारी प्रामाणिक निरागसता हा टागोरांच्या लिखाणाचा गाभा आहे. स्वत:शी संपूर्ण पारदर्शक राहून, एखाद्या बालकाप्रमाणे मनाची कवाडं सताड उघडी ठेवून घेतलेला स्वत:मधल्या देवत्वाचा शोध म्हणजे गीतांजली आहे व हीच टागोरांची थोरवी आहे, असं कविवर्य यीट्सना वाटतं.

—–

☆ गीत ४६ ☆

I KNOW not from what distant time thou art ever coming nearer to meet me. Thy sun and stars can never keep thee hidden from me for aye.

In many a morning and eve thy footsteps have been heard and thy messenger has come  within my heart and called me in secret. 

I know not why to-day my life is all astir, and a feeling of tremulous joy is passing through my heart. 

It is as if the time were come to wind up my work, and I feel in the air a faint smell of thy sweet presence. 

—–

☆ मराठी भावानुवाद : गीत ४६ ☆

ठाऊक नाही कधी, सौंदर्य तुझे मज भावले

सूर्य अन् तारे तुजला, ना लपवू शकले

*

कितीक दिवस मी ऐकते, पदरव तुझा तो

प्रेषित तुझा, हृदयात माझ्या, हळूच डोकावतो

*

आज अचानक कां थरथरे मी आतुनी

हृदयातील कंपने, आनंद लहरी उठवुनी,

*

मज सांगती चल आता, कर्म इथले संपले

तुझा सुगंध येता, अस्तित्व तव जाणले

*

ठाऊक नाही मी कधी तुजकडे आकर्षिले

किती काळ लोटला, भेटीसाठी चालले

भावानुवाद © मंजिरी येडूरकर 

संपर्क: ९४२१०९६६११

—–

☆ गीत ४७ ☆

THE night is nearly spent waiting for him in vain. I fear lest in the morning he suddenly come to my door when I have fallen asleep wearied out. Oh friends, leave the way open to him ⎯ forbid him not. 

If the sound of his steps does not wake me, do not try to rouse me, I pray. I wish not to be called from my sleep by the clamorous choir of birds, by the riot of wind at the festival of morning light. Let me sleep undisturbed even if my lord comes of a sudden to my door. 

Ah, my sleep, precious sleep, which only waits for his touch to vanish. 

Ah, my closed eyes that would open their lids to the light of his smile when he stands before me like a dream emerging from darkness of sleep. 

Let him appear before my sight as the first of all lights and all forms. The first thrill of joy to my awakened soul let it come from his glance. And let my return to myself be 

immediate return to him. 

—–

☆ मराठी भावानुवाद : गीत ४७ ☆

व्यर्थ रात्र गेली, त्याची पाहता वाट

मी असे निद्राधीन, होता भली पहाट

*

नका उठवू विनवितो, आला तो जरी दाराशी

पाखरांनो नका गाऊ, पवना नको पंगा नीरवतेशी

*

निद्रेच्या तमातून तो, स्वप्नासम उलगडू दे

त्याचीच पहिली प्रतिमा, मम नयनी उमटू दे

*

मनाचे जागेपण, त्याच्या तेजातून निथळू दे

जागृती येण्याआधी, नंदनवन त्याचे गाठू दे

भावानुवाद © मंजिरी येडूरकर

संपर्क: ९४२१०९६६११

—–

☆ गीत ४८ ☆

THE morning sea of silence broke into ripples of bird songs; and the flowers were all merry by the roadside; and the wealth of gold was scattered through the rift of the clouds 

while we busily went on our way and paid no heed. 

We sang no glad songs nor played; we went not to the village for barter; we spoke not a word nor smiled; we lingered not on the way. We quickened our pace more and more as the time sped by. 

The sun rose to the mid sky and doves cooed in the shade. Withered leaves danced and whirled in the hot air of noon. The shepherd boy drowsed and dreamed in the shadow of the banyan tree, and I laid myself down by the water and stretched my tired limbs on the grass. 

My companions laughed at me in scorn; they held their heads high and hurried on; they never looked back nor rested; they vanished in the distant blue haze. They crossed many meadows and hills, and passed through strange, far-away countries. All honour to you, heroic host of the interminable path! Mockery and reproach pricked me to rise, but 

found no response in me. I gave myself up for lost in the depth of a glad humiliation ⎯ in the shadow of a dim delight. 

The repose of the sun-embroidered green gloom slowly spread over my heart. I forgot for what I had travelled, and I surrendered my mind without struggle to the maze of shadows and songs. 

At last, when I woke from my slumber and opened my eyes, I saw thee standing by me, flooding my sleep with thy smile. How I had feared that the path was long and 

wearisome, and the struggle to reach thee was hard!

—–

☆ मराठी भावानुवाद : गीत ४८ ☆

पक्ष्यांची गीते, जागी सकाळ झाली

साज फुलांचा लेऊन, उषा नटली

*

ना खेळलो, ना हसलो, ना बोललो

ना उद्यमा गेलो, ना वाटेत रेंगाळलो

*

न कांही पाहिले, न कांही ऐकले

शोध घेता तुझा, मन पुढे धावले

*

ढगांतून सोनेरी प्रभा पसरली

तरी ना आनंदाची गाणी गायिली

*

माथ्यावर सूर्य, पाऊले वेगात निघाली

नाचऱ्या पानांनी उगाच गिरकी घेतली

*

गुराखी सावलीत पेंगुळले, हाती लाठी

गवतावर पहुडलो मी, पाण्याच्या काठी

*

अनंताच्या वाटेवरचे सहप्रवासी मज हसले

अनेक देश, टेकड्या, कुरणे; पार करण्या गेले

*

वेगात, न पलटता, अदृश्य झाले क्षितिजापार

व्यर्थ यत्न उठण्याचा केला, ऐकून तो तिरस्कार

*

शाल पांघरून आरामाची, घेतले निद्रेचे सुखासन

विसरलो, काय होते या प्रवासाचे प्रयोजन

*

जागा झालो, साक्षात् तू पडलास दृष्टी

स्मित हास्य तुझे, तूच निर्मिल्या या सृष्टी

*

मी वेडा, तुला भेटण्या वणवण करीत होतो

त्या सौंदर्या, त्या गीतांना पारखा होत होतो

– क्रमशः भाग १६.

मूळ इंग्लिश काव्य : श्री. रविंद्रनाथ टागोर.

भावानुवाद : कवयित्री : © सौ.मंजिरी येडूरकर

लेखिका व कवयित्री, मो – 9421096611

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “2FA”: टू फॅक्टर ऑथेंटिकेशन  ☆ डॉ. धनंजय देशपांडे ☆

डॉ. धनंजय देशपांडे

? इंद्रधनुष्य ?

“2FA”: टू फॅक्टर ऑथेंटिकेशन ☆ डॉ. धनंजय देशपांडे 

घराला दोन कुलुपे लावता – – 

– – मग सोशल मीडियाच्या अकाउंटला दोन कुलुपे का नाहीत?

घराच्या सुरक्षेसाठी एक लाकडी दरवाजा बिल्डर देत असतोच. पण आपण त्याला सांगून बाहेरून एक लोखंडी दरवाजा (सेफ्टी डोअर) बसवतो ना? आणि दोन्ही दरवाजाला कुलुपे लावतो ना? का लावतो? तर एक्स्ट्रा सिक्युरिटी म्हणून न?

मग जशी घराची काळजी घेता तशीच तुमच्या सोशल मीडिया अकाऊंटची पण घेतली पाहिजे न! जसे घरी चोरी झालेली आपल्याला झेपत नाही तसेच सोशल मीडिया अकाउंट हॅक झालेलेही झेपत नाही. मग त्यासाठीच सोशल मीडिया अकाउंटला दुहेरी सुरक्षा आजच बसवा. ज्याचे नाव आहे टू फॅक्टर ऑथेंटिकेशन (2FA)… ही प्रणाली तुम्ही ऍक्टिव्ह केल्यानंतर प्रामुख्याने तुमचे अकाउंट हॅक होण्याचा धोका संपुष्टात येतो. अर्थात ज्यांनी ऑलरेडी टू फॅक्टर ऑथेंटिकेशन ऍक्टिव्ह केले आहे त्यांना दंडवत आहेच पण असेही अनेकजण आहेत ज्यांना हे माहीतच नाही किंवा माहित आहे पण कसे करायचे ते माहित नाही, त्यांच्यासाठी हि पोस्ट आहे. यामध्ये महत्वाचे असे ईमेल अकाउंट, व्हाट्स अप अकाउंट आणि फेसबुक अकाउंट यासाठी स्टेप बाय स्टेप प्रोसिजर देतोय. नीट पाहून घेऊन त्याप्रमाणे कार्यवाही करा. 

*

ईमेलसाठी :

स्टेप 1: तुमच्या ईमेल अकाउंटमध्ये लॉग इन करा

स्टेप 2: तुमच्या अकाउंटच्या सेटिंग्स किंवा प्रोफाइल सेटिंग्समध्ये जा.

उजवीकडे वरच्या कोपऱ्यातील प्रोफाइल पिक्चरवर क्लिक करा > मग अकाउंट सेटिंग्स > मग सिक्युरिटी.

स्टेप 3: –टू फॅक्टर ऑथेंटिकेशन” किंवा “2FA” शोधा आणि त्यावर क्लिक करा. “Enable” किंवा “सक्षम करा” बटणावर क्लिक करा.

स्टेप 4: – तुमचा फोन नंबर किंवा ऑथेंटिकेटर ऐप (उदा. Google Authenticator, Authy) निवडा. फोन नंबर निवडल्यास, तुमच्या नंबरवर व्हेरिफिकेशन कोड येईल.

स्टेप 5: तुम्हाला मिळालेला व्हेरिफिकेशन कोड एंटर करा. – “Verify” बटणावर क्लिक करा.

स्टेप 6: तुम्हाला बॅकअप कोड मिळतील. ते सुरक्षित ठिकाणी सेव्ह करा. – हे कोड तुम्हाला तुमचा फोन नसताना अकाउंटमध्ये लॉग इन करण्यासाठी मदत करतील.

स्टेप 7: 2FA सक्षम झाले आहे का ते तपासा – त्यासाठी तुमच्या अकाउंटमध्ये लॉग आउट करा आणि पुन्हा लॉग इन करण्याचा प्रयत्न करा. – तुम्हाला 2FA कोड मागितला जाईल. तसे झाले की समजा सर्व सेट झाले आहे 

*

व्हाट्सअपसाठी टू फॅक्टर ऑथेंटिकेशन (2FA)

स्टेप 1: तुमच्या फोनमध्ये व्हाट्सअप ओपन करा.

स्टेप 2: सेटिंग्स मध्ये जा, उजवीकडे वरच्या कोपऱ्यातील तीन डॉट्सवर क्लिक करा > मग सेटिंग्स > मग अकाउंट > टू-स्टेप व्हेरिफिकेशन.वर क्लिक करा 

स्टेप 3: टू फॅक्टर ऑथेंटिकेशन सक्षम (ऍक्टिव्ह) करा त्यासाठी “Enable” बटणावर क्लिक करा. – तुमचा फोन नंबर व्हेरिफाई करा.

स्टेप 4: आता तिथे सहा डिजिट पिन (पासवर्ड) सेट करा आणि पुष्टी करा.म्हणजे ओके द्या. 

– हा पिन सुरक्षित ठिकाणी सेव्ह करा.

स्टेप 5: ईमेल आयडी सेट करा (वैकल्पिक)

– तुम्हाला हवे असल्यास, ईमेल आयडी सेट करा जेणेकरून तुम्हाला पिन रीसेट करण्यासाठी मदत होईल.

टू फॅक्टर ऑथेंटिकेशन सक्षम केल्याने तुमच्या व्हाट्सअप अकाउंटची सुरक्षा वाढते. 

*

फेसबुक साठी टू फॅक्टर ऑथेंटिकेशन (2FA)

स्टेप 1: तुमच्या फोनमध्ये फेसबुक ओपन करा.

स्टेप 2: सेटिंग्स मध्ये जा तिथं उजवीकडे वरच्या कोपऱ्यातील तीन लाइनवर क्लिक करा > सेटिंग्स & प्रायव्हसी > सेटिंग्स > सिक्युरिटी आणि लॉगिन.तिथं क्लिक करा. 

स्टेप 3: “टू फॅक्टर ऑथेंटिकेशन” किंवा “2FA” शोधा आणि त्यावर क्लिक करा.

-ते “Enable” किंवा “सक्षम करा” बटणावर क्लिक करा.

स्टेप 4: फोन नंबर किंवा ऑथेंटिकेटर ऐप निवडा

– तुमचा फोन नंबर किंवा ऑथेंटिकेटर ऐप (उदा. Google Authenticator, Authy) निवडा. फोन नंबर निवडल्यास, तुमच्या नंबरवर व्हेरिफिकेशन कोड येईल.

स्टेप 5 : तुम्हाला मिळालेला व्हेरिफिकेशन कोड एंटर करा. नंतर “Verify” बटणावर क्लिक करा.

झालं काम!

*

डॉ. डीडी क्लास : पाच दहा मिनिटांचे काम आहे पण तुमचं अकाउंट हॅकिंगचे टेन्शन कायमचे नष्ट करणार आहे. त्यामुळे नक्की करा. शिवाय घरच्यांनाही हे सांगून त्याचेही अकाऊंट सुरक्षित करा. वाटल्यास हि पोस्ट सेव्ह करून नंतर इतरांना पाठवून त्यांनाही सजग करा. 

©️ डॉ. धनंजय देशपांडे (dd)

(सायबर सिक्युरिटी तज्ञ, चित्रकार, लेखक, समुपदेशक, निवेदक)

मो न. ९४२२३०४३४४ 

1) Global Cyber Crime Helpline National Award winner

2) Digital Hero of the year National Award winner

3) HOD : Cyber Awareness Foundation, Maharashtra State

4) Mentor : transcendental-technologies, Asso. with Pune University (SPPU)

5) Mentor : Canadian Asso. for Security and Intelligence Studies – CANADA

6) Mentor : Direct Action International – UK

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ महापुरुषांचा पराभव… ☆ राधिका भांडारकर ☆

राधिका भांडारकर

? इंद्रधनुष्य ?

☆ महापुरुषांचा पराभव… ☆ राधिका भांडारकर ☆

विजय – पराभव, यश – अपयश, जिंकणं – हरणं या सर्वांमध्येच एक सूक्ष्म रेषा असते जी यशातलंही अपयश किंवा अपयशातलं यश, जिंकण्यातलं हरणं, हरण्यातलं जिंकणं ठरवत असते.

जगाच्या इतिहासात असे अनेक महापुरुष होऊन गेले, ज्यांचे विचार, कार्य किंवा लष्करी प्रतिभा विशाल असूनही त्यांना त्यांच्या अंतिम किंवा एखाद्या मोठ्या संघर्षात भीषण पराभवाला सामोरे जावे लागले.

फ्रान्सचा सम्राट नेपोलियन बोनापार्ट ज्याने युरोप जिंकला पण वॉटर्लूच्या लढाईत तो पराभूत झाला आणि त्याला आपले साम्राज्य गमवावे लागले.

विसाव्या शतकातील सर्वात शक्तिशाली हुकूमशहा हिटलर यांनी जर्मनीला एका मोठ्या युद्धाच्या खाईत लोटले पण शेवटी त्याचा स्वतःचाच पराभव झाला.

अलेक्झांडरने बहुतेक ज्ञात जग जिंकले परंतु भारतीय उपखंडातला प्रतिकार आणि सैन्याची झालेली दमणूक यामुळे त्याच्या विजयाची मोहीम खंडित झाली.

रोमन सम्राट नीरो याच्या राज्यातील अस्थिरतेमुळे त्यालाही सत्ता गमवावी लागली आणि त्याचा अंत शोकांतिक झाला.

अमेरिकेचे प्रेसिडेंट आणि वर्णद्वेषाविरुद्ध लढणाऱ्या अब्राहम लिंकन यांचाही त्यांच्याच देशात खून झाला.

गॅलिलिओ, टॉलस्टाॅय, साॅक्रेटीस यांच्यासारख्या महापुरुषांनाही प्रस्थापित सत्तेपुढे हार मानावी लागली.

महात्मा गांधीजी नाही पराभूत राजकारणी आणि विजयी महात्मा म्हटले जाते. वैचारिक पातळीवर ते विजयी झाले पण राजकीय स्तरावर मात्र पराभूत झाले. भारतीय संविधानाचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकरांनाही मुंबई आणि भंडाऱ्यातून दोनदा पराभूत व्हावे लागले.

मुळात महापुरुषांना विशिष्ट जातीत आणि गटात वाटल्यामुळेही ते पराभूत ठरले. त्यांच्या अनुयायांच्यातल्या स्पर्धा त्यास कारणीभूत ठरल्या.

एकंदर या सर्वांचा विचार करत असताना सहज मनात येते पराभूत असूनही या सर्व व्यक्ती मानवी मनातून दूर झाल्या नाहीत कारण एकेकाळचा इतिहास त्यांनी त्यांच्या धोरणाने घडवला होता.त्यांच्या पराभवाची कारणेही विविध होती.

मात्र *महापुरुषांचा पराभव* या विषयाचा विचार करताना, त्याची कारणे ठरवताना तो नक्की कुणामुळे आणि कशामुळे झाला याचा अभ्यास करताना, तो दोन ठळक भागात करावा लागतो एक त्यांच्या तत्त्वांचा त्यांच्याच अनुयायांकडून झालेला पराभव आणि दुसरा म्हणजे त्यांची तत्त्वेच, अति महत्त्वाकांक्षा त्यांच्या वैयक्तिक अपयशाची किंवा पराभवाची मूलभूत कारणे ठरू शकतात.

एखाद्या महान व्यक्तीचा त्यांच्या अनुयायांकडूनच कसा पराभव होतो याचा विचार करताना काही ठळक बाबी मनात उतरतात. कुठलीही व्यक्ती ही तिच्या कर्माने महान ठरते. प्राप्त परिस्थितीकडे निराळ्या दृष्टिकोनातून बघून समाजावरची संकटे दूर करण्याचा किंवा समाज उद्धाराचा त्या व्यक्तीचा प्रयत्न असतो. त्या कार्यामुळेच ती व्यक्ती महान ठरते. छत्रपतींनी स्वराज्याच्या प्राप्तीला नेहमी “श्रींची इच्छा” असे म्हटले कारण कार्य श्रेष्ठ असते. व्यक्ती कार्यामुळे महान बनते.

कार्यापेक्षा जास्त कुठलीच व्यक्ती श्रेष्ठ नसते. महापुरुषांच्या जीवनाच्या उत्तरार्धात त्यांचे अनुयायी मात्र त्यांनी आरंभिलेले कार्य पुढे नेण्याऐवजी त्या महापुरुषाची पूजा करण्यात धन्यता मानतात. इथूनच व्यक्ती पूजेला सुरुवात होते आणि महापुरुषांच्या तत्त्वांचा पराभवही सुरू होतो. त्यांच्या तत्त्वांना काळानुरूप बदलतं स्वरूप देण्याऐवजी, अथवा त्यातील निकड, गरज समाजाला समजावण्याऐवजी त्यांचे (त्या व्यक्तींचे) फक्त पुतळे उभारण्यात धन्यता मानतात आणि एक प्रकारे समाजाची दिशाभूल होऊन वैचारिक कुजवणूकही होते. पर्यायाने महापुरुषाचे कार्य, कार्यकारणता, उद्देश हे सर्व विरून जाते. केवळ गळ्यात पुष्पमाळा घालून कोनाड्यात बसवलेलं देवत्त्व त्यांना दिलं जातं. त्यांच्या जयंत्या, पुण्यतिथ्या साजर्‍या केल्या जातात. कधी त्यांच्याविषयी केलेल्या विधानांचा त्यांच्या अनुयायांकडून निषेध वगैरे होतो.

थोडक्यात व्यक्तीपूजन होते. जेव्हा कार्यापेक्षा व्यक्ती श्रेष्ठ होते तिथेच महापुरुषांचं अपयश मोजलं जातं आणि याला जबाबदार त्यांचे अनुयायी असतात. गांधीजी, बाबासाहेब आंबेडकर यांच्या बाबतीत नेमकं हेच घडलं. त्यांचे उदात्त विचार, पराकोटीची सामाजिक बांधिलकी, नैतिकतेचा आग्रह, यांच्याशी जेव्हा त्यांच्याच अनुयायांयांकडून प्रतारणा होते किंवा त्यांच्या वागण्यात विसंगती आढळते तेव्हा नाईलाजाने म्हणावे लागते की महापुरुषांचा पराजय त्यांचे अनुयायीच करत असतात.अधिक तीव्रतेने, अथवा कठोरपणे असंही म्हणता येईल की ज्यांना आपण या महापुरुषांचे अनुयायी म्हणतो ते प्रत्यक्षात फक्त राजकीय फायद्यासाठी त्यांचे “तोंडीलावणं” करतात तेव्हा या महापुरुषांचे झालेले आत्मिक पराभव जाणवतात.

याच विषयाच्या दुसऱ्या भागात “अनुयायी” हा घटक दूर ठेवला तर त्या व्यक्तीच्या आचारसंहितेतच कुठेतरी त्यांच्या पराजयाची बीजे सापडतात आणि यासाठी मला पुराणकालीन युगपुरुषांचाही वेध घ्यावासा वाटतो. प्रजाहितदक्ष, मर्यादापुरुष श्रीरामाचे चरित्र वाचतानाही त्यांनी केलेल्या “सीतेच्या त्यागाचं”समर्थन ओढूनताणूनच करावं लागतं.

पुराणातल्या महापुरुषांचा विचार माझ्या मनात जेव्हा येतो तेव्हा नकळत आणि अगदी अलगद माझं मन महाभारतातल्या महापुरुषांचा विचार करू लागतं. महाभारतातल्या कथा लहानपणापासून जशा सांगितल्या गेल्या तशा स्वीकारल्या गेल्या पण त्यानंतर जेव्हा जाणीवा काहीशा प्रगल्भ होत गेल्या तेव्हा महाभारतात गणल्या जाणाऱ्या थोर, धोरणी, कर्तव्यनिष्ठ शब्दकठोर, वचनबद्ध महापुरुषांविषयी संदेह निर्माण होऊ लागला. त्यात द्रोणाचार्य, अश्वत्थामा, युधिष्ठीर, कर्ण हे सुद्धा सारे महापुरुषच होते पण कुठे ना कुठे ते पराभूत होते, त्यांची कुठल्या ना कुठल्या प्रकारची महानताच त्यांना पराभूत करण्यासाठीचे कारण ठरली असे ठामपणे वाटतं.

त्यापैकी एका व्यक्तीचा मला या लेखात जाणीवपूर्वक परामर्श घ्यावासा वाटतो आणि ती व्यक्ती म्हणजे ज्यांनी आजन्म ब्रह्मचर्य आणि हस्तीनापूरच्या सिंहासनाशी एकनिष्ठ राहण्याची भीषण शप्पथ घेतली होती ते कुरू साम्राज्याचे पितामह, एक महान योद्धे आणि नीतीज्ञ. त्यांची जीवनकथा, त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात घडलेल्या घटना, त्यांच्या प्रतिज्ञा, कुरु साम्राज्यात घडलेल्या प्रसंगाशी त्या त्या वेळच्या त्यांच्या भूमिका, त्या भूमिकांना दिलेलं वचनबद्धतेचं उदात्त कवच, कुरुक्षेत्रातल्या लढाईतलं त्यांचं सेनापतीपद आणि धोरण या अनेक बाबींचा एखाद्या विस्तृत कॅनव्हासवर मांडणी करून आढावा घेतला तर हा महापुरुष पराभूतच होता हे जाणवतं.

देवव्रत ते भीष्म ते भीष्माचार्य ते पितामह हा त्यांचा जीवन प्रवास आणि त्यांच्या भूमिकेवर नक्कीच एक मोठं प्रश्नचिन्ह आकारतं. सोमवंशातील राजा शंतनु आणि गंगा यांचा पुत्र आणि महाभारतातील अत्यंत विख्यात असा एक महापुरुष म्हणजे भीष्म. मूळ नाव देवव्रत परंतु सत्यवती नामक धीवर कन्येवर त्यांच्या वडिलांचे मन बसले आणि तिच्याशी विवाह व्हावा म्हणून “माझ्याच मुलाला राज्य प्राप्त व्हावे” या तिच्या अटीला त्यांनी मान्यता दिली त्याचवेळी देवव्रतने ब्रह्मचर्याची शपथ घेतली आणि या भीषण प्रतिज्ञेमुळे त्यांना भीष्म असे उपनाव प्राप्त झाले आणि तेच प्रख्यात झाले. या प्रतिज्ञेपासूनच खरं म्हणजे भविष्यातल्या त्यांच्या पराभवाचा पाया रचला गेला. रणविद्या, राजनीती, अर्थशास्त्र, अध्यात्म, धर्मनीती इत्यादी क्षेत्रातील त्यांचे ज्ञान अलौकिक होते.

“सर्वशास्त्रवेत्ता” म्हणूनच त्यांना मानले जायचे. कुरुवंशातील शंतनूपासून दुर्योधनापर्यंत अनेक पिढ्यांची त्यांनी काळजी घेतली. चित्रांगद आणि विचित्रवीर्य या सावत्र भावांचे ते संरक्षक बनले. आंबा, अंबिका, अंबालिका या राजकन्यांचे स्वयंवर त्यांनी जिंकले पण या मुली त्यांनी त्यांचा सावत्र भाऊ विचित्रवीर्यासाठी जिंकून आणल्या. स्वीकारलेल्या तत्त्वांचे काटेकोर पालन करणे हा त्यांचा स्वभाव म्हणून आमरण ब्रह्मचर्याच्या प्रतिज्ञेशी ते अशा रीतीने चिकटून राहिले.

परशुरामांनी अंबेशी विवाह करण्याची त्यांना आज्ञा केली होती पण तीही त्यांनी पाळली नाही परिणामी अंबा सूडबुद्धीने ग्रासली गेली आणि कुरुक्षेत्री याच अंबेने शिखंडीच्या रूपात पुनर्जन्म घेऊन अर्जुनासोबत लढताना भीष्मास हरवले. शिखंडी रुपातल्या अंबेकडून म्हणजेच एका स्त्री कडून आलेल्या बाणांचा भीष्मांनी प्रतिकार केला नाही म्हणूनच ते रणांगणात अखेर कोसळले.

दु:शासनाने भर दरबारात केलेली द्रौपदीची विटंबना हा महापुरुष थांबवू शकला नाही हा केवढा तरी मोठा कलंक या महान विद्वान व्यक्तीवर कायमचा लागलेला आहे.
द्रौपदीने त्यांना प्रश्न केला होता, ” जुगारात हरलेल्या युधिष्ठीरास मला पणाला लावायचा काय अधिकार होता? वस्त्रहरणाच्या वेळी पितामह तुम्ही मौन धारण करून न्यायाच्या दरबारात माझा अपमान का केलात? ”

द्रौपदीचा हा प्रश्न म्हणजे भीष्माच्या आचारसंहितेवर आणि न्यायाच्या उल्लंघनावर केलेला थेट आरोप होता. त्यांचा कायदेशीरपणा आणि नीतिमत्तेवरच तिने प्रश्नचिन्ह उभे केले होते आणि इथेच या महापुरुषाचा दारुण पराभव अधोरेखित होतो.

“कुरुवंशाचे खाल्लेले मीठ विरोधास रोकतं” हे त्यांनी केलेलं त्यांच्या मौनाचं समर्थन अत्यंत पांगळं नव्हतं का? कौरवांचे दोष दिसत असतानाही युद्धात त्यांच्याच बाजूने लढणे, ज्या कुलाचे रक्षण करण्यासाठी प्रतिज्ञा केली ते कुल नष्ट होण्याची चिन्हे दिसत असतानाही केवळ प्रतिज्ञेला चिकटून राहण्यासाठी असत्य, अधर्माविषयी मौन बाळगणं हे या महापुरुषाच्या नैतिक पराभवाचं मूळ कारण आहे.

युद्धानंतर इच्छामरणी, मृत्युला उत्तरायण सुरू होईपर्यंत थांबवणारे, शरपंजरी पहुडलेले पितामह भीष्म कृष्णास प्रश्न विचारतात.

“एका क्रूर वास्तवास मला का सामोरे जावे लागत आहे? इतिहास माझ्याकडे कोणत्या दृष्टीने बघेल? ” त्यावेळी कृष्ण सांगतात, ” कुरुक्षेत्रातील रक्तपात हा धर्माच्या पुनर्स्थापनेसाठी गरजेचा होता. जरी त्यात पितृतुल्य व्यक्तींचा वध होणे वेदनादायी होते.” श्रीकृष्ण पुढे सांगतात, ” जेव्हा क्रूरता आणि अधर्म मर्यादा ओलांडतात तेव्हा प्रतिज्ञा, वचनबद्धता, शब्दकठोरता हा आत्मघाती मार्ग ठरतो. पितामह! तुमच्या वैचारिकतेत नैतिकता असली तरी वास्तविक लवचिकता नव्हती. असत्य आणि अधर्म दिसत असतानाही तुम्ही तुमच्या विचारांची माघार पत्करली असती तर आज हा रक्तपात नव्हे हे युद्धच वाचले असते. पितामह! म्हणून नेमके इथेच तुम्ही खऱ्या अर्थाने पराभूत झालात.”

एका महापुरुषाचा पराभव कलियुगात किंवा युद्धाच्या काळात हेच सूचित करेल की भीष्माचार्यांसारख्या जुन्या नियमांपेक्षा अन्यायाविरुद्ध लढण्याचे कृष्णा सारखे धोरणच उपयुक्त आहे. कृष्ण -भीष्म यांच्या संवादातून हेच स्पष्ट होते की न्यायाच्या रक्षणासाठी काही कठोर निर्णय घ्यावे लागतात. स्वीकृत धोरणांना छेद द्यावे लागतात. जे भीष्मासारख्या ज्ञानी पुरुषाला का समजू शकले नाही?

महापुरुषांचा पराभव याविषयाचा विचार करतांना भीष्माचार्यांचे उदाहरण प्रातिनिधीक स्वरूपातले आहे.

वर्तमानात होणाऱ्या निवडणुकांचा, युद्धांचा, युद्धात कोसळणाऱ्या अथवा हत्या होणाऱ्या त्या त्या देशांतील नेत्यांचा, त्यांच्या पराभवाचा विचार भविष्यात जेव्हा कधी होईल तेव्हा त्यांच्याही पराभवाची कारणे अशीच त्यांचे अनुयायी, राजकीय आणि वैयक्तिक स्तरावर तपासली जातील हे नक्कीच.

© राधिका भांडारकर

पुणे

मो.९४२१५२३६६९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “आठवणी दाटतात!!” ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

☆ “आठवणी दाटतात!!” ☆ श्री संभाजी बबन गायके

मेजर संदीप उन्नीकृष्णन

राऊळात जाता श्री विठ्ठलाची भेट झाली नाही म्हणजे पांडुरंग परमात्मा कुठे तरी दूर, बाहेर गेले असतील. त्यांना येण्यास का बरं वेळ लागतो आहे? असं कुठल्या कामात अडकलेत देव, कुणाच्या भेटीत एवढे गुंतून राहिले असतील? जी अवस्था संत जनाबाईंची तीच अवस्था मूल गमावलेल्या आईची आणि अर्थात बापाचीही! जनाबाईंचा विठ्ठल तरी त्यांना भेटला…पण या आई-बापास त्यांचा विठ्ठल किमान या जन्मी तरी दिसणार नाही प्रत्यक्ष. त्याची जागा दुसरं कुणी घेऊ शकेल अशीही स्थिती नव्हती. त्याच्याऐवजी नव्हे, पण त्याच्यासारखं कुणीतरी आयुष्यात आलं तर…ते कुणाला नको असेल?

एकुलता एक मुलगा…देशरक्षणासाठी जातो म्हणाला. त्याला अडवून उपयोग नव्हताच. प्रकाश पसरवणारा तो संदीप…यांच्या संदीपने देशाचा प्रकाश तेवत राहावा म्हणून स्वत: विझून जाणं पसंत केलं. 

हिंदुस्थानला युद्धात पराभूत करू शकत नाही…पण त्याला सतत रक्तबंबाळ तर करूच शकतो…असं शत्रूच्या म्होरक्याने त्यांच्या पळपुट्या सेनेला शिकवून ठेवलं आहे. “we will bleed them a thousand times” आम्ही एक हजार वेळा युद्ध करू…अशी त्यांची दर्पोक्ती असते..आणि प्रत्येक पराभवानंतर ते हेच म्हणत राहतात. त्यानुसार ते एकेदिवशी देशाच्या आर्थिक राजधानीत घुसले. शेकडो निष्पाप नागरीकांना ओलीस धरले! त्यांना हुसकावून लावण्यासाठी मोठी किंमत मोजावी लागली!

२६ नोव्हेंबर, २००८. केरळ(मूळ गाव), कर्नाटक(जन्म, बालपण) आणि महाराष्ट्राशी (एन.डी.ए.खडकवासला) नाते असलेले मेजर संदीप उन्नीकृष्णन…मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील हल्लेखोरांवर चालून गेलेला झंझावात! Operation Tornado मध्ये 51, Special Action Group (51 SAG) चे पथक प्रमुख म्हणून मेजर साहेब दहा कमांडोजसह ताजच्या सहाव्या मजल्यावर पोहोचले. ओलिसांची सहाव्या मजल्यावरून सुटका करीत ते पाचव्या मजल्यावर पोहोचले. तोच चौथ्या मजल्यावरील एका मोठ्या दालनात अतिरेकी असल्याची शंका आली…दालनाचा दरवाजा आतून बंद होता!

दरवाजा तोडून उघडला गेला…आतून प्रचंड गोळीबार झाला…आपला एक कमांडो जबर जखमी झाला. त्या दालनात हातगोळा फेकून अतिरेकी तिथून दुस-या ठिकाणी निसटून गेले.

मेजर साहेबांनी उर्वरीत कमांडोज सोबत घेत आणखी सुमारे १५ तास ओलिसांची सुखरूप सुटका करण्याचे काम केले. २७ नोव्हेंबरची मध्यरात्र. ताज मधील मध्यभागी असलेल्या जिन्याने वरच्या मजल्यावर एकट्याने शोध घेत जाण्याचा निर्णय साहेबांनी घेतला!

याच प्रयत्नात त्यांनी चार अतिरेक्यांना एका खोलीत आश्रय घ्यायला भाग पाडले…आता त्यांचा पळण्याचा मार्ग बंद…मध्ये मेजर साहेब होते. ते त्यांच्या साथीदारांना म्हणाले…”तुम्ही कुणीही वर येऊ नका…ते धोक्याचे आहे. मी यांचा बंदोबस्त करेन…! आणि मेजर साहेब त्या अंधा-या, धुराने भरलेल्या दालनात घुसले…चार रायफली धडाडल्या…साहेबांनी त्यांच्यावर गोळ्यांचा वर्षाव केला…पण अतिरेक्यांच्या गोळ्यांनी मेजर साहेबांना पुरते घायाळ करून टाकले! एक दीप विझून गेला होता!

साहेबांचे आई-वडील ताज मधील त्या दालनाला दरवर्षी २७ नोव्हेंबरच्या रात्री, मध्यरात्री भेट देतात…जिथे मेजर साहेबांनी शेवटचा श्वास घेतला, त्या खोलीत थांबतात…त्यांच्या अश्रूंना वाटा फुटतात. या दोघांनी आपल्या लेकाच्या स्मृती जपण्याचा आटोकाट प्रयत्न सुरु ठेवला आहे…काळ जखमा भरून टाकतो…पण यांच्या जखमा अजूनही ओल्याच आहेत!

पुतळे उभारले गेले, रस्त्यांना नांवे दिली गेली. चित्रपट हे एक अत्यंत प्रभावी माध्यम आहे. जो प्रभाव एखादा ग्रंथ करू शकणार नाही, तो प्रभाव काही तासांत एखादा उत्तम चित्रपट निर्माण करू शकतो. विषय अतिशय रोमांचक असल्याने अनेक चित्रपट निर्माते मेजर साहेबांचे वडील के.उन्नीकृष्णन (ISRO मधील सेवानिवृत्त संशोधक) आणि साहेबांच्या मातोश्री धनलक्ष्मी यांना भेटले. “आम्ही मेजर साहेबांच्या कामगिरीवर चित्रपट बनवू म्हणाले. पण या व्यावसायिक लोकांचा आविर्भाव “आम्ही तुमच्यावर उपकारच करतो आहोत” असा असल्याचे या दोघांना वाटले. त्यामुळे त्यांनी कुणालाच परवानगी दिली नाही. माझा मुलगा देशासाठी हुतात्मा झाला..त्यामुळे तो सर्व देशाचा मुलगा ठरला. पण राजकीय मंडळी त्यांच्या त्यांच्या स्वार्थासाठी अशा बलिदानांचा वापर करून घेतात, याचा त्यांना राग होता. त्यांनी केरळच्या मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्याला घरी येण्यास थेट मज्जाव केला होता. मध्ये असेच काही दिवस गेले!

हैदराबादेत जन्मलेला पण अमेरिकेत वाढलेला एक युवा अभिनेता, लेखक आणि अनेक तेलगु चित्रपटांत चमकलेला आणि बाहुबली चित्रपटात खलनायकाच्या वेशात दिसलेल्या देखण्या आदिवी सेश याच्याही मनात मेजर साहेबांची कथा घोळत होती. त्यांनी उन्नीकृष्णन दांपत्याचे मन वळवले…आणि एक नातं आकार घेऊ लागलं! आदिवी यांनी स्वत: कथा, पटकथा लिहिली आणि मेजर संदीप यांची भूमिकाही निभावली…किंबहुना जगली! चित्रपट निर्मितीच्या प्रक्रियेत तन-मन आणि धनाने सहभागी झाले. मध्येच उपटलेल्या कोरोना संकटातही हार न मानता एक सामाजिक जबाबदारी म्हणून ‘मेजर’ चित्रपट तयार व्हावा म्हणून मेहनत घेतली. या काळात कोरोनाने जगाला हैराण करून ठेवले होते, या चित्रपट निर्मितीमध्ये सहभागी असलेल्या अनेकांचे जवळचे आप्त यात दगावले. या सर्व परिस्थितीमध्ये धैर्य न गमावता आदिवी काम करीत राहिले…Mission Major!

पण आदिवू यांनी संदीप उन्नीकृष्णन यांचे जीवन समजावून घेतले. Don’t come up! I will handle them! हे मेजर साहेबांनी त्या रात्री उच्चारलेले वाक्य त्यांनी मनात बिंबवून घेतलं. मेजर साहेबांच्या आयुष्यात आलेल्या जवळजवळ सर्वांशी आदिवू स्वत: बोलले, त्या त्या ठिकाणांना भेटी दिल्या…आणि पडद्यावर एक वीर गाथा साकारली गेली. 

‘मेजर’ चित्रपटाच्या पहिल्या प्रदर्शनाला मेजर साहेबांच्या मातोश्री, मेजर साहेबांनी त्यांना भेट दिलेली साडी परिधान करून आल्या होत्या. आदिवी त्यांना ‘अम्मा’ संबोधतात! मी मेजर संदीप यांची जागा कदापि घेऊ शकणार नाही…पण अम्माचा धाकटा मुलगा तर होऊच शकतो. आदिवी यांच्यामुळे उन्नीकृष्णन दांपत्याच्या चेह-यावर कित्येक वर्षांनी पहिल्यांदा हास्य उमटलं…ही खूप मोठी गोष्ट होती. 

आदिवू यांनी चित्रपटातून मिळणा-या पैशांचा विचार केला नाही. हिंदी आणि तेलगु भाषांत हा चित्रपट वेगवेगळा चित्रित केला. हा चित्रपट त्यांनी जागतिक पातळीवर पोहोचावा यासाठी खूप प्रयत्न केले. याचवेळी दक्षिणेतील महान अभिनेत्यांचे चित्रपट प्रदर्शित झाले होते…पण तरीही ‘मेजर’ चित्रपटाने उत्तम पैसे मिळवले. अधिकाधिक तरुणांपर्यंत मेजर संदीप यांची शौर्यगाथा पोहोचावी म्हणून कित्येक ठिकाणी हा चित्रपट विनामूल्यही दाखवण्यात आला. मेजर संदीप उन्नीकृष्णन यांचा जन्म केरळ येथे झाला होता. केरळसाठी हा चित्रपट खास मल्याळम भाषेतही ‘डब’ करण्यात आला होता. मेजर आणि मेजर संदीप अशी दोन शीर्षके या चित्रपटासाठी राखून ठेवण्यात आलेली होती. तत्पूर्वी अमिताभ बच्चन यांचा मेजर साहब हा हिंदी चित्रपट येऊन गेला होताच. अर्थात याची कथा वेगळी होती. 

भारतात चित्रपट निर्मिती हा प्रचंड मोठा व्यवसाय आहे. अभिनेते, अभिनेत्री यांचा चाहता वर्ग मोठा आहेच…शिवाय या लोकांचे अनुकरणही खूप केले जाते…लोक यांनाच हिरो मानतात. पण देशासाठी खरेखुरे बलिदान देणा-या सैनिकांच्या कथा सामान्य लोकांपर्यंत व्यवस्थित पोहोचत नाहीत. अनेक वीरांची माहितीच लोकांना कधीही होत नाही. या पार्श्वभूमीवर आदिवी सेश या अभिनेत्याने दाखवलेले धाडस कौतुकास्पदच म्हणावे लागेल! अभिनंदन, आदिवी! मेजर संदीप उन्नीकृष्णन यांना मरणोत्तर अशोक चक्र प्रदान करण्यात आले. १५ मार्च हा यांचा वाढदिवस! यानिमित्ताने त्यांच्या स्मृती जागवण्याचा हा प्रयत्न. जय हिंद!

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ईश्वरार्पणम्… लेखक: डॉ. सरवनन – माहिती संकलक : मधुकर बोरीकर ☆ प्रस्तुती – स्मिता सुहास पंडित ☆

स्मिता सुहास पंडित

? इंद्रधनुष्य ?

☆ ईश्वरार्पणम्… लेखक: डॉ. सरवनन – माहिती संकलक : मधुकर बोरीकर ☆ प्रस्तुती – स्मिता सुहास पंडित ☆

विज्ञानाच्या पलीकडे जे काही आहे,  ते सर्व म्हणजेच परमेश्वर आहे,  हे सिद्ध करणारी ही कहाणी आहे. आपण कर्ता असलो तरी करविता केवळ ‘तो’च असतो हे दाखवून देणारा हा लेख आहे.

जीवनाचा खरा अर्थ आणि त्यापलीकडचे सत्य म्हणजे ‘देव’च आहे.

मी MRI स्कॅनकडे पाहिलं आणि अंगावर काटा आला. तो हॉस्पिटलच्या एअर कंडिशनरमुळे नव्हता,  तर समोर दिसणाऱ्या दाहक सत्यामुळे होता. तो साक्षात मृत्यूचा आदेशच होता — काळ्या-पांढऱ्या अक्षरांत छापलेला.

*या हॉस्पिटलमध्ये मला एक दंतकथा म्हणतात. *

मी डॉ. सरवनन — व्हॅस्क्युलर सर्जरीचा निवृत्त प्रमुख.

चाळीस वर्षं मी मानवी शरीराच्या आत काम केलं आहे. चेन्नईच्या रस्त्यांपेक्षा मला माणसांच्या रक्तवाहिन्यांचा नकाशा अधिक चांगला माहीत आहे. धडधडणारी हृदयं मी हातात धरली आहेत,  छतावर रक्त उडवणाऱ्या नसा मी शांत केल्या आहेत. पण त्या स्कॅनकडे पाहताना,  इतक्या दशकांनंतर पहिल्यांदाच,  मला स्वतःला मी सर्जन आहे असं वाटलं नाही. मला स्वतःचीच फसवणूक झाल्यासारखं वाटलं.

रुग्णाचं नाव गौरी होतं.

वय अवघं सव्वीस. एकटी आई. दोन शिफ्ट्समध्ये एका छोट्या उपहारगृहात काम करून घर चालवणारी. कॉफी ओतताना ती अचानक कोसळली. तिच्या हृदयामधील अ‍ॅन्युरिझम (रक्तवाहिनी ज्या ठिकाणी कमजोर होते,  त्या ठिकाणी नसतील रक्तदाबामुळे येणारा फुगीर भाग. रक्तदाब अधिक वाढला तर ही नस फुटू शकते आणि असीमित रक्तस्त्राव होऊ लागतो.) फक्त मोठा नव्हता — तो राक्षसी होता. हृदयाच्या अतिशय नाजूक भागाभोवती तो अजगरासारखा विळखा घालून बसला होता.

*“हे ऑपरेशन शक्य नाही,  वरदन, ” विभागप्रमुखांनी मान हलवत सांगितलं. *

*“आत गेलात,  तर टेबलवरच ती मुलगी रक्तस्राव होऊन मरेल. हात लावला नाहीत,  तरी ४८ तासांत नस फुटेल. दोन्ही मार्गांनी मृत्यूच. ”*

*वैद्यकीय व्यवस्थेत आम्हाला जोखमी तोलून पहायला शिकवलं जातं. कायदेशीर जबाबदाऱ्या,  यशाची टक्केवारी — सगळं. *

*तर्क सांगत होता,  ” वहात लावू नकोस. निसर्गावर सोड. मागे फिर. “*

*पण मग मी गौरीच्या डोळ्यांत पाहिलं आणि वेटींग रूम मध्ये बसलेली तिची चार वर्षांची चिमुकली मुलगी दिसली. वहीत चित्रं काढत तिथे बसली होती. तिने फाटके बूट घातले होते. * 

*गौरी गेली,  तर ती मुलगी एकटी पडणार होती. बाहेरच्या जगात तिचे आईविना किती हाल होतील या विचारानेच तिच्याविषयी वाटणाऱ्या करुणेने माझे मन भरून गेले होते. मी प्रशासनाला ऑपरेशन थिएटर ठरवायला सांगितलं. *

*मी केस घेणार असल्याचं जाहीर केलं. ते मला वेड्यात काढत होते. कदाचित मी होतोही. *

*ऑपरेशनच्या आदल्या रात्री,  मी माझ्या अंधारलेल्या ऑफिसमध्ये बसलो होतो. बाहेर शहर झगमगत होतं — आत टांगणीला लागलेल्या एका जीवाबद्दल पूर्णपणे उदासीन असलेलं. *

*मी घाबरलो होतो. दगडासारखे स्थिर असणारे माझे हात थरथरत होते. स्कॅन पुन्हा पुन्हा पाहिला. *

*कुठलाच मार्ग नव्हता. कुठलीच आशा नव्हती. हे आत्मघातकी मिशन होतं. *

*मी विज्ञानावर विश्वास ठेवणारा माणूस आहे. *

*स्कॅलपेल,  टाके,  रक्तदाब — ह्यांवर. * 

*पण माझ्या टेबलावर,  वैद्यकीय जर्नल्सच्या ढिगाऱ्यामागे,  एक लहानसं,  प्लास्टिक लॅमिनेट केलेलं वैद्येश्वराचं चित्र आहे. माझ्या आजीनं मेडिकल कॉलेज सुरू करताना दिलं होतं. *

ती म्हणाली होती —

*“औषध शरीरावर उपचार करतं,  पण माणसाला देव बरा करतो. ”*

मी ते चित्र हातात घेतलं.

कोणतीही औपचारिक प्रार्थना केली नाही.

फक्त गौरीची फाईल हातावर ठेवली,  देवाच्या प्रतिमेकडे पाहिलं आणि अंधारात हळूच बोललो —

*“हे प्रभो…, या वेळेला माझे हात अपुरे पडतायत. *

*मी इथे फक्त एक मेकॅनिक आहे. *

*उद्या सकाळी तुम्हालाच ऑपरेशनसाठी यावं लागेल. *

*मी हात देतो…, *

*पण बुद्धी तुम्ही द्या. *

*आज सर्जन तुम्हीच आहात. ”*

*दुसऱ्या दिवशी ऑपरेशन थिएटर मध्ये गोठवून टाकणारं थंड वातावरण होतं. तणावानं भरलेलं. नर्सेस शांत होत्या. भूलतज्ज्ञ तर,  माझ्याकडे पाहायलाच तयार नव्हते. *

सगळ्यांना माहित होतं — *”आपण एका अटळ सत्याकडे चाललो आहोत. तिचा मृत्यू अटळ होता. “*

ऑपरेशन सुरू झालं.

*स्कॅनपेक्षाही परिस्थिती वाईट होती. रक्तवाहिनी कागदासारखी पातळ,  आणि जणू संतापून धडधडत होती. एक चुकीचा श्वास,  एक सूक्ष्म कंप — आणि सगळं संपणार होतं. *

*मी मायक्रो-कात्री उचलली. *

*तो क्षण होता. Widowmaker क्षण. * (widowmaker artery= left anterior descending artery हृदयाच्या बहुतांश भागाला शुद्ध रक्त पुरवणारी,  एक अत्यंत महत्वाची रक्तवाहिनी)

*या क्षणाच्या अलीकडे होतं जीवन आणि पलीकडे उभा होता केवळ मृत्यू! *

*आणि ते घडलं. * 

*खोलीत पूर्ण शांतता पसरली. फक्त शांतता नाही,  — पोकळी. *

*मॉनिटर्सचे आवाज दूर कुठेतरी विरून गेले. *

*माझ्या खांद्यांवरून एक विलक्षण उब पसरली,  हातांमधून बोटांपर्यंत वाहत गेली. तो अ‍ॅड्रेनालिन नव्हता. *

*ही होती… शांतता. *

*गंभीर,  भारलेली शांतता. *

*माझे हात वेगाने हलू लागले. स्पष्टच सांगतो —*

*”मी ते हलवत नव्हतो,  मी ते हलताना पाहत होतो. *

*मी यापूर्वी कधीच न शिकलेली कौशल्ये वापरत होतो. सत्तर वर्षांच्या माणसाला अशक्य असलेली गती आणि अचूकता माझ्या बोटांत कुठूनतरी आली होती. मेंदूच्या देठाजवळ,  मिलिमीटर अंतरावर,  क्षणाचाही संकोच न करता काम चालू होतं. दिसतही नसणाऱ्या ठिकाणी मी नेमक्या क्लिप्स लावत होतो — कुठलीतरी दैवी जाणीव मला मार्ग दाखवत होती. *

*“BP स्थिर आहे…”* *भूलतज्ज्ञ आश्चर्याने कुजबुजला. *

मी उत्तर देऊ शकलो नाही.

*मी एका तंद्रीत होतो. *

*”माझ्या मागे कुणीतरी उभं आहे,  माझ्या कोपरांना दिशा देत आहे,  मनगट स्थिर करत आहे”* — *अशी तीव्र जाणीव होती. *

*क्षणभर वाटलं,  खरंच दुसराच कोणी डॉक्टर टेबलजवळ उभा आहे. *

पंचेचाळीस मिनिटांनी मी शेवटचं उपकरण ट्रेमध्ये ठेवलं.

*“अ‍ॅन्युरिझम संपलं आहे,  नसेवर आलेलं फुगीरपणा गेला आहे. ”* मी म्हणालो.

*“आता बंद करा. ”*

*थिएटरमध्ये एकच गोंधळ उडाला. नर्सेस रडत होत्या. *

*रेसिडेंट्स मॉनिटर्सकडे अविश्वासाने पाहत होते. *

*एक थेंबही रक्त गेलं नव्हतं. *

*ते अशक्य होतं — पण परिपूर्ण होतं. *

मी गाऊन काढून हात धुण्याच्या ठिकाणी गेलो.

आरशात पाहिलं.

*अशा ऑपरेशननंतर मी नेहमी थकलेला,  घामाघूम,  पाठ दुखत असणारा असतो. *

*आज मला यापैकी काहीही जाणवत नव्हतं. मी शांत होतो. अजिबात थकलो नव्हतो. *

 *मी माझ्या सुरकुतलेल्या,  वृद्ध हातांकडे पाहिलं. * 

*आज त्यांनी एका आईला वाचवलं होतं. एका छोट्या मुलीला अनाथ होण्यापासून वाचवलं होतं. *

*पण सत्य फक्त मला माहीत होतं. *

मी ऑफिसमध्ये परत गेलो,  वैद्येश्वराचं ते छोटंसं चित्र उचललं आणि खिशात ठेवलं.

*एका आठवड्यानंतर मी डिस्चार्जच्या कागदावर सही केली. *

गौरी तिच्या मुलीचा हात धरून बाहेर पडली. डोळ्यांत अश्रू,  *”मला हिरो… किंवा देव “* म्हणत होती.

मी हसलो आणि मान हलवली.

*“मी एकट्याने नाही केलं, ”* मी म्हणालो.

*तिला वाटलं,  मी टीमबद्दल बोलतोय. *

*पण त्या दिवशी मुख्य सर्जन कोण होता,  हे मला माहीत होतं. *

*विज्ञान ‘कसं’ हे सांगू शकतं. रक्तप्रवाह,  नसांचं जाळं,  सगळं सगळं. *

*पण ‘का’ — हे कधीच सांगू शकत नाही. *

*अशक्याच्या समोर उभा असलेला माणूस अचानक मार्ग कसा शोधतो,  हे विज्ञान समजावू शकत नाही. *

*कधी कधी स्वीकारावं लागतं,  की,  आपण फक्त एक साधन आहोत. *

आणि त्या मंगळवारी,  ऑपरेशन थिएटर क्रमांक ४ मध्ये, *खरा वैद्य — परमवैद्य — स्वतः हजर होता. *

*कधीही आशा सोडू नका. *

*स्कॅन काळा असला तरी,  जग संपलं असं म्हणत असलं,  तरीही! *

*चमत्कार नेहमी वीज-गडगडाटासह येत नाहीत. कधी कधी ते फक्त स्थिर हातांमध्ये…, आणि शांत प्रार्थनेत येतात. *

जय वैद्येश्वर.

सर्व कृतींच्या पाठीमागील शक्ती दाखवणारी अतिशय सुंदर कथा..

 

मूळ इंग्रजी लेखक : डॉ. सरवनन

संकलक : मधुकर बोरीकर 

प्रस्तुती : स्मिता सुहास पंडित

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “सापाच्या विषावरील उतारा!” – इंग्रजी लेखक : अज्ञात ☆ मराठी अनुवाद – श्री सुनील देशपांडे ☆

श्री सुनील देशपांडे

? इंद्रधनुष्य ?

☆ “सापाच्या विषावरील उतारा!” – इंग्रजी लेखक : अज्ञात ☆ मराठी अनुवाद – श्री सुनील देशपांडे ☆

वायन्स बायोटेक प्रा. लि. द्वारे हैदराबादमध्ये भारतातील अँटी स्नेक बाईट इंजेक्शन तयार केले जाते!!

त्याबद्दल आपण जाणून घेऊ.

या कंपनीचा एक मोठा घोड्यांचा तबेला आणि प्रजनन केंद्र आहे,  उत्तम गुणवत्ता नियंत्रण आणि पर्यायाने गुणवत्ता हमी आहे.

नाग सापाच्या विषारी दंशाने हत्तीलाही मारले जाऊ शकते,  पण एक प्राणी त्यापासून बचावतो: घोडा!

कोणत्याही विषारी सांपाने दंश केला तरी घोडा त्यातून मरत नाही. दंश केल्यानंतर,  घोडा सुमारे तीन दिवस हलका असला तरी,  तो पूर्णपणे ठीक होतो,  जसे काहीच झाले नाही.

हे निसर्गातील एक अविश्वसनीय आश्चर्य आहे.

आणि या प्राण्यातच मानवासाठी जीवन वाचवण्याचे एक रहस्य आहे – अँटी-वेनोम व्हॅक्सीन.

पण हे अँटी-वेनोम व्हॅक्सीन कसे बनवले जाते?

प्रथम,  सांपांचे विष गोळा केले जाते.

मग,  घोड्यास थोड्या प्रमाणात विष टोचले जाते.

घोड्याची प्रतिकारशक्ती प्रतिसाद देते आणि विष निष्प्रभ करण्यासाठी प्रतिद्रव्य तयार करते.

2-3 दिवसांनंतर,  ही प्रतिद्रव्ये घोड्याच्या रक्तात असतात.

मग घोड्याचे रक्त घेतले जाते आणि लाल रक्तपेशी काढून टाकल्या जातात.

प्लाझ्मा (पांढरा भाग) अँटी-वेनोम तयार करण्यासाठी प्रक्रिया केला जातो.

हे अँटी-वेनोम नंतर सांपाने दंश केलेल्या मानवांमध्ये इंजेक्ट केले जाते,  त्यांचे जीवन वाचवण्यासाठी.

केवळ भारतात,  शेकडो घोड्यांची देखभाल करून हे जीवन वाचवणारे सीरम तयार करण्यासाठी अनेक अँटी-वेनोम उत्पादन सुविधा आहेत.

या सौम्य प्राण्यामुळे,  आम्ही पृथ्वीवरील काही घातक विषांपासून संरक्षित आहोत.

घोड्यांशिवाय,  सांपाच्या दंशामुळे अनेकांना जीवन गमवावे लागेल.

हे निसर्गाच्या रहस्य,  दया आणि अंगभूत योजनेचे आणखी एक वैशिष्ट्य आहे.

निसर्गाचा प्रत्येक घटक हे अशा आश्चर्यजनक कृपेचे प्रतिबिंब आहे.

— 

(एका इंग्लिश पोस्टवरून अनुवादित) 

इंग्लिश लेखक : अज्ञात 

मराठी अनुवाद : श्री सुनील देशपांडे 

मो  ९६५७७०९६४०

ईमेल : sunil68deshpande@outlook.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ मनाचे श्लोक – एक सार्वकालिक ‘मनोपनिषद’… – श्लोक १५ आणि १६ ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्री विश्वास देशपांडे

? इंद्रधनुष्य ?

☆ मनाचे श्लोक – एक सार्वकालिक ‘मनोपनिषद’… – श्लोक १५ आणि १६ ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्लोक पंधरावा – – 

मना पाहता सत्य हे मृत्यूभूमी |

जिता बोलती सर्वही जीव मी मी`

 चिरंजीव हे सर्वही मानिताती |

अकस्मात सांडूनिया सर्व जाती १५|

अर्थ:

आपल्या भोवताली दिसणारे सुंदर जग म्हणजे मृत्यूभूमी आहे ही सत्य गोष्ट आहे. असे असले तरी माणूस जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत अहंकारामुळे मी मी करीत असतो. आपण अमर आहोत अशीच सर्वांची भावना असते. परंतु एक दिवस अचानक हे सगळेच सोडून जावे लागते.

आधीच्या श्लोकात समर्थ आपल्याला महाथोर ते मृत्यूपंथेची गेले असे सांगतात. या श्लोकात आपण ज्या पृथ्वीवर म्हणजेच इहलोकांत राहतो तो इहलोक किंवा ही पृथ्वी मृत्यूभूमी कशी आहे हे समजावून सांगतात. हे जग नित्य बदलते आहे किंबहुना बदल हाच या जगाचा स्थायिभाव आहे. उत्पत्ती, स्थिती आणि लय या तीनही अवस्था पृथ्वीवर आपल्याला बघायला मिळतात. भासमान असणाऱ्या या दृश्य जगात प्रत्येक गोष्ट आपल्याला उत्पत्ती, स्थिती आणि लय या अवस्थातून जाताना दिसते. माणसाला देखील याच अवस्थांमधून जावे लागते. तरीसुद्धा प्रत्येक माणूस स्वतःला चिरंजीव समजतो आणि आपण केलेल्याचा अहंकार मिरवत असतो. हा अहंकार भल्याभल्यांचा घात करतो. ज्यांना साधना मार्गावर चालायचे आहे, त्यांना तर अहंकार विषाप्रमाणे वर्ज्य आहे. संत, सद्गुरू किंवा सद्ग्रंथ यांच्यामध्ये अहंकार दूर करण्याचे सामर्थ्य असते. म्हणून साधकाने त्यांचा आश्रय घ्यावा.

माणूस आयुष्यभर सुखाच्या मागे लागून पैसा कमावतो. घरदार, मुलेबाळे सगळे नाती निर्माण होतात. परंतु या सगळ्या गोष्टी इथेच राहतात. माणूस गेला की पैसा, धन, संपत्ती जागच्या जागीच राहते आणि इतरांची मालमत्ता होते. पत्नी त्याला दारापर्यंत पोहोचविण्यास येते, समाजातील लोक त्याला स्मशानापर्यंत पोहोचवतात. मात्र अगदी अंगावरचा कपडा देखील सोबत येत नाही. सोबत जाते ते फक्त आपले कर्म. परंतु तरीही माणसाचा ताठा किंवा गुर्मी शेवटपर्यंत कायम असते. मी एवढा पैसा कमावला, मी एवढे वैभव मिळवले, मला एवढे यश मिळाले, हे सगळे माझ्या कर्तृत्वामुळे ! माझी मुले, माझी बायको असे सगळे तो मी मी करत असतो.

काही लोक गैरमार्गाने अमाप संपत्ती कमावतात परंतु अंत्यसमयी त्यातील काहीही कामी येत नाही. करोडोंची संपत्ती असते परंतु एखाद्या दुर्धर आजाराने दवाखान्यात दाखल व्हावे लागले की पैसा सुद्धा त्याला बरे करू शकत नाही. आयुष्य वाढवून मिळत नाही की गेलेले क्षण परत येत नाहीत. हे सगळे सोडून कधीही अचानक जावे लागते. ‘नाही घडीचा भरवसा, कोण काळ येईल कैसा‘ हेच खरे. समर्थ म्हणतात

घटका गेली, पळे गेली, तास वाजे ठणाणा,

आयुष्याचा नाश होतो राम कारे म्हणाना”

प्रत्येक क्षण मृत्यूच्या दिशेने जात असताना, संसाराच्या मायेत न अडकता ईश्वराचे (रामाचे) नामस्मरण करावे, कारण तोच कायमचा आधार आहे. म्हणून जोपर्यंत आयुष्य आहे तोपर्यंत आपण आपला प्रत्येक क्षण सार्थकी लावला पाहिजे आणि परमेश्वर प्राप्तीच्या दिशेने पाऊल टाकले पाहिजे. तेच मानवी जीवनाचे अंतिम ध्येय आहे.

स्वसंवाद :

  • माझ्या आयुष्यात मी हे केले किंवा हे सगळे माझ्यामुळे आहे असा अहंकार बाळगतो का ?
  • पैसा, पद, प्रतिष्ठा या गोष्टी कायमच्या नाहीत हे मला खरोखर पटते का?
  • माझ्या आयुष्यातील सत्कर्मेच माझ्यासोबत येतील यावर माझा विश्वास आहे का ? ( क्रमशः )

– – – 

श्लोक सोळावा – – 

मरे एक त्याचा दुजा शोक वाहे। 

अकस्मात तोही पुढे जात आहे॥ 

पुरेना जनीं लोभ रे क्षोभ त्याते। 

म्हणोनी जनीं मागुता जन्म घेते॥१६॥

अर्थ : आपली प्रिय किंवा जिव्हाळ्याची व्यक्ती गेली, मरण पावली म्हणजे दुःख होणे स्वाभाविक आहे. परंतु अशा व्यक्तीच्या निधनाचे दुःख करीत बसणारा देखील त्याच रांगेत उभा असतो आणि अकस्मात त्याला देखील हे जग सोडून जावे लागते. शोक हा लोभ किंवा मोहापोटी असतो. त्यातून क्षोभ म्हणजे नाशालाच जन्म मिळतो म्हणून माणूस पुन्हा पुन्हा जन्म मरणाच्या फेऱ्यात अडकतो.

आधीच्या श्लोकात समर्थ आपल्याला काळ हा आपल्या पाठीशी लागलेला आहे हे अटळ सत्य सांगतात. भगवद्गीतेत सांगितल्याप्रमाणे जातस्य हि ध्रुव मृत्यू. जो जन्मला त्याला मृत्यू निश्चित आहे. या श्लोकात ते मृत्यूबद्दलच अधिक सांगून आपल्याला जागृत करण्याचा प्रयत्न करतात. आपली प्रिय व्यक्ती मरण पावली म्हणजे दुःख होणे स्वाभाविक आहे. आपण आपल्या प्रिय व्यक्तीच्या दुःखाचा शोक करत बसतो परंतु हा शोक लोभ किंवा मोहाच्या पोटी असतो असेच समर्थांना सांगायचे आहे. कारण त्यातून क्षोभ निर्माण होतो आणि हा क्षोभ सर्वनाशाला कारणीभूत ठरतो.

मृत्यू पावलेल्या व्यक्तीबद्दल दुःख करीत बसताना आपल्यालाही एक दिवस त्याच वाटेने जायचे आहे हे आपण लक्षात ठेवले पाहिजे. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर मृत्यूची जाणीव आपल्याला कायमस्वरूपी असली पाहिजे. म्हणजे आज माझी प्रिय व्यक्ती मला सोडून गेली परंतु उद्या मला देखील त्याच मार्गाने जायचे आहे. हे लक्षात घेतले तर आपोआपच जगण्याची आसक्ती आणि इहलोकीचा लोभ कमी होतो. असे झाले म्हणजे व्यक्ती आपल्या कर्तव्यापासून च्युत होत नाही.

उपकार या हिंदी चित्रपटात अभिनेता प्राणच्या तोंडी जीवनाचं तत्त्वज्ञान सांगणारं एक फार सुंदर गाणं आहे. त्यात कवी म्हणतो,” कस्मे वादे प्यार वफा सब बाते है, बातों का क्या ? कोई किसी का नही है, झूठे नाते है नातोंका का क्या ?”

गाडगे बाबा कीर्तन करीत असताना कोणीतरी त्यांना त्यांचा एकुलता एक मुलगा गोविंदा गेल्याची बातमी सांगितली. तेव्हा ते म्हणाले

किती मेले कोट्यानुकोटी

काय रडू एकासाठी ?

लोकमान्य टिळक केसरीचा अग्रलेख लिहित असताना त्यांना देखील आपला मुलगा वारल्याची बातमी कळाली. परंतु त्यांनी आपले दुःख बाजूला ठेवून अग्रलेख पूर्ण केला आणि दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणेच केसरीचा अंक निघाला. ही सगळी मंडळी महान असली तरी त्यांना दुःख झाले नसेल का ? निश्चितच झाले असणार. परंतु त्याचे रूपांतर त्यांनी शोकामध्ये होऊ दिले नाही आणि आपल्या कर्तव्य मार्गावर ते अग्रेसर राहिले. कारण त्यांना देखील पुढे आपणही त्याच मार्गाने कधीतरी जाणार आहोत याची जाणीव होती.

समर्थ असे सांगतात की अति शोक हा मोहातून निर्माण होतो. मोह म्हणजेच लोभ किंवा वासना. असे षडरिपूंचे मायाजाल आपल्याला जगण्यात किंवा ज्या अनंत अशा राघवाच्या मार्गावर आपल्याला चालायचे आहे त्यापासून परावृत्त करते. माणसाने त्यातून बाहेर पडले पाहिजे.

इच्छेतून वासना निर्माण होतात. वासनेतून काम किंवा षडरिपू निर्माण होतात. त्यात आपण अडकलो की जन्ममरणाच्या चक्रातून आपली सुटका नाही. आपण पुन्हा पुन्हा जन्म घेत राहतो आणि मृत्यू पावत राहतो. माणसाचे अंतिम ध्येय मोक्ष हेच आहे. म्हणूनच मरणाचा अति शोक न करता आपल्यालाही एक दिवस त्याच मार्गाने जायचे आहे हे लक्षात ठेवून आपले कर्तव्य करीत राहणे महत्त्वाचे आहे.

आपल्या संस्कृतीत जे चार आश्रम सांगितले आहेत, त्यातील वानप्रस्थाश्रमाची कल्पना फार सुंदर आहे. ती यासाठी फार उपयोगी पडते. वानप्रस्थाश्रमात संसारातील लक्ष हळूहळू काढून घ्यायचे असते. आजच्या काळात प्राचीन काळाप्रमाणे वानप्रस्थाश्रम शक्य नाही. परंतु काही ठराविक वयानंतर मुलांच्या बरोबर संसारात राहताना आपली आसक्ती हळूहळू कमी करायला हवी. ही आसक्ती जोपर्यंत कमी होत नाही, तोपर्यंत मुलांच्या संसारात अप्रत्यक्षपणे आपली ढवळाढवळ सुरूच राहते आणि त्याचे प्रमाण अति वाढले म्हणजे मुलांना देखील आपण नकोसे होतो. ही आसक्ती सोडता आली तर अंतकाळी जो मोह किंवा लोभ शिल्लक राहतो, तो राहणार नाही आणि त्यामुळे जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून आपली सुटका होऊ शकेल.

स्वसंवाद : 

  • माझ्या प्रिय व्यक्तींबद्दल असलेले माझे प्रेम हे आसक्तीत तर बदलत नाही ना?
  • मृत्यू अटळ आहे ही जाणीव मी खरंच मनापासून स्वीकारली आहे का?
  • दुःखाच्या प्रसंगी मी खचून जातो की कर्तव्य मार्गावर स्थिर राहण्याचा प्रयत्न करतो?
  • संसारातील मोह आणि लोभ कमी करण्यासाठी मी काही प्रयत्न करतो का?
  • माझ्या आयुष्याचे अंतिम ध्येय केवळ संसारापुरते मर्यादित आहे की आत्मोन्नतीकडेही माझे लक्ष आहे?

– क्रमशः श्लोक १५ आणि १६.  

© श्री विश्वास देशपांडे

चाळीसगाव

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “अनृण्य” ☆ श्री दिवाकर बुरसे ☆

श्री दिवाकर बुरसे

? इंद्रधनुष्य ?

☆ “अनृण्य” ☆ श्री दिवाकर बुरसे ☆

अनृण्य 

– – – ऋणमुक्त जीवनाची भारतीय संकल्पना

    – – कृतज्ञता, कर्तव्य आणि जीवनाचे नैतिक तत्त्व

प्रस्तावना

कधी कधी एखाद्या शब्दावरून सुरू झालेली अल्पशी चर्चा आपल्याला भारतीय संस्कृतीच्या गाभ्यापर्यंत घेऊन जाते. “आनृण्य की अनृण्य?” हा प्रश्नही तसाच आहे. हा केवळ शब्दरूपाचा वाद नसून भारतीय जीवनदृष्टीतील एका महत्त्वपूर्ण नैतिक संकल्पनेशी संबंधित आहे.

शब्दाची व्युत्पत्ती

“अनृण्य” हा शब्द संस्कृतमधील “ऋण” या शब्दापासून निर्माण झाला आहे. “ऋण” म्हणजे देणे, कर्ज किंवा दायित्व. “अन्” हा नकारार्थी उपसर्ग जोडल्यावर “अनृण” म्हणजे ऋण नसलेला असा अर्थ होतो. त्याचेच भाववाचक रूप “अनृण्य” असून त्याचा अर्थ ऋणमुक्तता असा आहे.

मराठी भाषेत “आनृण्य” असे रूपही अनेकदा दिसते; परंतु व्युत्पत्तिशास्त्रीय दृष्टिकोनातून “अनृण्य” हेच अधिक प्रमाणभूत रूप मानले जाते.

जन्मतः ऋणी असलेला मनुष्य

भारतीय चिंतनानुसार मनुष्य या जगात पूर्णपणे स्वतंत्र येत नाही. तो काही मूलभूत ऋणांनी बद्ध असतो. आपल्या अस्तित्वामागे निसर्ग, देवता, ऋषी आणि पूर्वज यांचे योगदान असते. म्हणूनच जीवन म्हणजे केवळ अधिकारांचा उपभोग नसून कृतज्ञतेने ऋणांची परतफेड करण्याचा प्रवास आहे.

धर्मशास्त्रात या विचाराला त्रि-ऋण सिद्धांतअसे म्हटले जाते.

तीन मूलभूत ऋणे

देवऋण

  • विश्वव्यवस्था आणि निसर्गाच्या देणगीबद्दलची कृतज्ञता.

यज्ञ, उपासना, सदाचार आणि धर्मपालन यांद्वारे हे ऋण फेडले जाते.

ऋषिऋण

  • ज्ञानपरंपरा घडवणाऱ्या ऋषींचे ऋण.

अध्ययन, स्वाध्याय, अध्यापन आणि ज्ञानसंवर्धन यांद्वारे हे ऋण परतफेडले जाते.

*पितृऋण*

पालक आणि पूर्वजांचे ऋण.

कुटुंबसंरक्षण, संतती, परंपरेचे जतन आणि पूर्वजस्मरण यांद्वारे हे ऋण फेडले जाते.

धर्मग्रंथांचा आधार

भारतीय धर्मग्रंथांनी या विचाराला स्पष्टपणे मांडले आहे. मनुस्मृतीत असे म्हटले आहे —

ऋषिभ्यो देवताभ्यश्च पितृभ्यश्चैव मानवः ।

ऋणी जायते तस्मात् त्रिभ्य एव प्रतिपूजयेत् ॥

अर्थ : मनुष्य जन्मतः देव, ऋषी आणि पितर यांचा ऋणी असतो; म्हणून त्याने या तिघांप्रती कृतज्ञतेने आपली कर्तव्ये पार पाडली पाहिजेत.

महाभारतातही धर्मविचाराच्या संदर्भात यज्ञ, स्वाध्याय आणि कुटुंबकर्तव्य यांद्वारे ही ऋणे फेडण्याचे महत्त्व सांगितले आहे.

कालिदासाच्या रघुवंश महाकाव्यात राजा दिलीपाच्या कथेत पितृऋण पूर्ण करण्याची भावना सूचित होते.

– – –  यावरून या संकल्पनेचा प्रभाव धर्मशास्त्राबरोबरच काव्यपरंपरेवरही पडलेला दिसतो.

संतपरंपरेतील भावार्थ

मराठी संतांनी “अनृण्य” हा शब्द थेट वापरला नसला तरी त्यामागील भावार्थ अत्यंत सुंदर रीतीने व्यक्त केला आहे. संत म्हणतात —

  • “देह देवाचे मंदिर
  • करावे त्याचे सेवाकार्य.”

या ओळीत जीवनाची दिशा सूचित होते. देह आणि जीवन ही देवाची देणगी मानून त्याचा उपयोग सेवा, साधना आणि सदाचारासाठी करणे हीच देवऋणाची खरी परतफेड आहे.

आधुनिक जीवनातील अनृण्य

आजच्या काळात “अनृण्य” ही संकल्पना केवळ धार्मिक कर्मकांडापुरती मर्यादित राहिलेली नाही. समाज, संस्कृती, निसर्ग आणि मानवजातीप्रती असलेली कृतज्ञता व्यक्त करणे आणि त्यांच्याप्रती आपली दायित्वे पार पाडणे हेच तिचे आधुनिक रूप आहे… .. .. 

— पालकांची सेवा करणे_

— गुरूंनी दिलेले ज्ञान पुढील पिढीपर्यंत पोहोचवणे_

— समाजासाठी कार्य करणे_

— निसर्गाचे संवर्धन करणे_

– – – ही सर्व कृत्ये म्हणजे आपल्या ऋणांची परतफेडच होय.

अंतिम विचार

भारतीय संस्कृतीचा मूलस्वर कृतज्ञतेचा आहे.

जीवनात आपण जे काही प्राप्त करतो ते पूर्णपणे स्वतःचे नसते; त्यामागे असंख्य अदृश्य हातांचा सहभाग असतो.

म्हणूनच —

  • उपकारांचे स्मरण ठेवून कर्तव्यपूर्तीने जगणे .. हेच “अनृण्य” या संकल्पनेचे खरे सार आहे.
  • ऋणमुक्त जीवन म्हणजे उपकार विसरणे नव्हे, .. .. तर कृतज्ञतेने जीवन अर्थपूर्ण करणे होय.

© श्री  दिवाकर बुरसे

पुणे

संपर्कः ९२८४३००१२५, ९५५२६२९२४५

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ मनाचे श्लोक – एक सार्वकालिक ‘मनोपनिषद’… – श्लोक १३ आणि १४ ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्री विश्वास देशपांडे

? इंद्रधनुष्य ?

☆ मनाचे श्लोक – एक सार्वकालिक ‘मनोपनिषद’… – श्लोक १३ आणि १४ ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्लोक १३ वा – –

मना सांग पां रावणा काय जाले।

अकस्मात ते राज्य सर्वै बुडाले॥

म्हणोनी कुडी वासना सांडी वेगीं।

बळे लागला काळ हा पाठिलागी॥१३॥

अर्थ: हे मना, महापराक्रमी अशा रावणाचा अंत कसा झाला या गोष्टीचा विचार कर. त्याला कल्पनाही नसताना त्याच्या राज्याचा संपूर्णपणे नाश झाला. म्हणून वाईट वासना सोडून दे. कारण सर्व शक्तिमान असा काळ सर्वांच्याच पाठीमागे लागलेला आहे.

आधीच्या श्लोकात समर्थ आपल्याला “विवेके देहेबुद्धी सोडूनि द्यावी” असे सांगतात. विवेक हा शब्द अतिशय महत्त्वाचा आहे. माणसाजवळ ज्ञान, संपत्ती, सत्ता, ऐश्वर्य सर्व काही असेल परंतु विवेकाची उणीव असेल तर त्याचे जीवन व्यर्थ जाते. जीवनात सारासार बुद्धीचा म्हणजेच विवेकाचा वापर करून वागले पाहिजे. रावण शक्तिमान होता. देवांनाही त्याने बंदी बनवले होते. तो वेदांचा जाणकार होता परंतु त्याच्या मनातील दुष्ट वासनांनी त्याचा घात केला. परस्त्रीच्या मोहाने त्याने सीतेसरख्या पतिव्रतेला पळवून आणले. त्याचे हे दुष्कृत्य त्याची पत्नी मंदोदरी, त्याचा भाऊ बिभीषण आणि दरबारातील गुरुजनांना आवडले नाही. त्यांनी त्याला वेळोवेळी सीतेला सन्मानाने परत पाठव असे सांगितले. परंतु मदांध आणि वासनांध रावणाला ते पटले नाही. त्यामुळे फक्त त्याचाच नाही तर त्याच्या संपूर्ण राज्याचा विनाश झाला.

पुत्रमोह आणि सत्तेचा लोभ यामुळे अंध झालेल्या धृतराष्ट्राने आपला पुत्र दुर्योधन, दुःशासन इ. च्या दुष्कृत्यांचा विरोध न करता त्यांना मूक संमतीच दिली. दुर्योधनाने सुद्धा पांडवांची पत्नी असलेल्या द्रौपदीची अभिलाषा धरली होती. त्यामुळे कौरवांचा संपूर्णपणे नि:पात झाला. महाभारतात एका प्रसंगी दुर्योधन बोलताना असे म्हणतो की चांगले काय आणि वाईट काय हे मला कळते. परंतु मला चांगले वागण्याची बुद्धीच होत नाही. याचाच अर्थ दुर्योधन आपल्या मनातील वाईट विचारांचा, वासनांचा त्याग करू शकला नाही विवेकाने वागू शकला नाही. “म्हणोनी कुडी वासना सांडी वेगी” असे समर्थ म्हणूनच म्हणतात.

या रामायण महाभारतातील उदाहरणाव्यतिरिक्त इतिहासात आणि वर्तमानात देखील वाईट वासना मनात ठेवून वागल्यामुळे व्यक्तीच्या आयुष्याचा विनाश झाल्याची अनेक उदाहरणे आहेत. अनेक राजे आणि राज्यांचा नाश झाला आहे. अनितीने वागल्यामुळेच अनेक व्यक्तींनी स्वतःचा विनाश ओढवून घेतला आहे. काळ हा सर्वशक्तिमान आहे. त्याची सर्वांवर सत्ता चालते. जन्मलेल्या व्यक्तीला मृत्यू निश्चित असतो परंतु तो केव्हा येईल हे सांगता येत नाही. म्हणून वेळीच सावध होणे गरजेचे. तीच जाणीव आपल्याला समर्थ या ठिकाणी करून देतात. ” पापाची वासना नको दावू डोळा “असे संत तुकाराम महाराज देखील आपल्याला सांगतात ते यामुळेच.

महाभारतात यक्ष आणि युधिष्ठिर यांचा एक संवाद याबाबतीत अतिशय समर्पक असा आहे. ” या जगातील सगळ्यात मोठे आश्चर्य कोणते? “असा प्रश्न यक्ष युधिष्ठिराला विचारतो. त्यावर युधिष्ठिराने दिलेले उत्तर मोठे छान आहे. तो म्हणतो, ” जन्मलेल्याला मृत्यू निश्चित आहे परंतु तरीही त्याचे भान व्यक्तीला नसते. आपण अमर आहोत असेच सगळे वागत असतात. हेच या जगातील सगळ्यात मोठे आश्चर्य आहे. “

या सगळ्या इतिहासातील उदाहरणांवरून आपण काहीतरी बोध घ्यायचा असतो. इतिहास हा केवळ वाचण्यासाठी नव्हे तर त्यापासून शिकण्यासाठी असतो. पुढच्या ठेच मागचा शहाणा असे आपण म्हणतो ते याच अर्थाने! आपले आयुष्य मर्यादित असते. म्हणून मृत्यूचे भान ठेवून प्रत्येकाने वाईट वासनांचा त्याग केला पाहिजे आणि आपल्या आयुष्यात सत्कर्मांना स्थान दिले पाहिजे असेच समर्थांचे सांगणे आहे. आणि हे जेवढ्या लवकर लक्षात येईल तेवढे चांगले!

स्वसंवाद :

  • माझ्या मनात अजूनही कोणत्या वाईट वासनांचे बीज दडलेले आहे का?
  • रावण किंवा दुर्योधन यांच्या कथांमधून मी खरोखर काही बोध घेतो का?
  • सत्ता, अहंकार किंवा मोह यामुळे माझ्या विवेकावर पडदा तर पडत नाही ना?
  • जीवन क्षणभंगुर आहे ही जाणीव ठेवून मी माझा वर्तमान अधिक सजगपणे जगतो का?
  • माझ्या आयुष्यात सत्कर्मांची वाढ आणि दुष्प्रवृत्तींचा त्याग करण्यासाठी मी सजग प्रयत्न करतो का?

श्लोक १४ वा 

जिवा कर्मयोगे जनीं जन्म जाला ।

परी शेवटीं काळमुखीं निमाला ॥

महाथोर ते मृत्युपंथेचि गेले ।

कितीएक ते जन्मले आणि मेले ॥१४॥

अर्थ :

आपल्या पूर्वसंचित कर्मांमुळे आपल्याला हा मनुष्यजन्म प्राप्त होतो. हा जन्म खरोखरच दुर्लभ आहे; परंतु असे असले तरी मृत्यू कोणालाही चुकलेला नाही. म्हणून हे मना, विचार कर – या जगात अनेक महापुरुष होऊन गेले; परंतु त्यांनाही मृत्युपंथाची वाट धरावीच लागली. सर्वसामान्य माणसे तर किती जन्मली आणि मेली याची गणतीच नाही.

या श्लोकातून समर्थ रामदास स्वामी मानवी जीवनाचे एक अटळ सत्य सांगतात. मागील श्लोकात त्यांनी “बळे लागला काळ हा पाठिलागी” असे म्हटले आहे. त्याच विचाराची अधिक स्पष्ट मांडणी येथे दिसते. मनुष्यजन्म दुर्लभ असला तरी मृत्यू हा त्याचा अविभाज्य भाग आहे.

राम, कृष्ण, संत ज्ञानेश्वर यांसारखे महान पुरुष या पृथ्वीवर होऊन गेले; पण त्यांनाही एक दिवस मृत्युपंथाचा स्वीकार करावाच लागला. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात – “जे जे उपजे ते नाशे”. म्हणजेच जे निर्माण होते ते नाश पावतेच. जन्म आणि मृत्यूचे हे चक्र अखंड चालूच असते.

निसर्गातही हेच दिसते. झाडावरील पिकलेली पाने गळून पडतात आणि त्यानंतरच नव्या पालवीला जागा मिळते. थोडक्यात सांगायचे तर नवनिर्मितीसाठी जुन्याचा निरोप आवश्यक असतो. मृत्यू ही देखील निसर्गाच्या या नित्यचक्रातील एक महत्त्वाची क्रिया आहे.

जन्म आणि मृत्यू या जणू एका नाण्याच्या दोन बाजू आहेत. जीवनाला कंटाळलेले वृद्ध किंवा असाध्य रोगांनी त्रस्त झालेले काही जण मृत्यूला वरदान मानतात. भगवद्गीतेत सांगितल्याप्रमाणे मनुष्य जुने झालेले वस्त्र टाकून देऊन नवीन वस्त्र धारण करतो; त्याप्रमाणे आत्मा जर्जर देह सोडून नवीन शरीर धारण करतो. त्यामुळे मृत्यू हा अंत नसून नव्या प्रवासाची सुरुवात आहे असेही म्हणता येईल.

तरीसुद्धा माणसाच्या मनात मृत्यूचे भय असते. कारण देहाशी असलेली आसक्ती फार प्रबळ असते. परंतु काळापुढे सर्व समान असतात. लहान-थोर, स्त्री-पुरुष, राजा-रंक असा कोणताही भेद काळ करत नाही. म्हणूनच समर्थ “परी शेवटीं काळमुखीं निमाला” असे अत्यंत नेमके शब्द वापरतात.

राम, कृष्ण किंवा संत ज्ञानेश्वर यांसारख्या महान विभूतींनी आपले अवतारकार्य पूर्ण करून देह ठेवला. त्यांच्यासारख्या महापुरुषांचेही जीवन मर्यादित होते. मग सामान्य माणसांचे जीवन किती क्षणभंगुर आहे याची जाणीव आपण ठेवली पाहिजे.

आपल्याला हा जन्म पूर्वसंचितानुसार मिळतो. आपल्या मनातील वासना पूर्ण करण्यासाठी आणि कर्मफळे भोगण्यासाठी आपण जन्म घेतो असे सांगितले जाते. चांगल्या कर्मांचे चांगले फळ मिळते, तर वाईट कर्मांचे दुष्परिणाम भोगावे लागतात. भोग संपेपर्यंत जीवनयात्रा सुरूच राहते.

म्हणूनच समर्थ आपल्याला सूचित करतात की या दुर्लभ मनुष्यजन्माचे महत्त्व ओळखावे. प्रपंच करत असतानाही परमार्थाचा मार्ग धरावा. जीवनाचा उपयोग सत्कर्मांसाठी आणि आत्मोन्नतीसाठी करावा.

स्वसंवाद :

  • माझ्या जीवनाचे अंतिम ध्येय काय आहे याचा मी कधी गंभीरपणे विचार केला आहे का?
  • मृत्यू अटळ आहे ही जाणीव ठेवून मी माझे वर्तमान अधिक अर्थपूर्ण जगतो का?
  • हा दुर्लभ मनुष्यजन्म मला काही चांगले करण्यासाठी मिळाला आहे का, याचा मी कधी विचार करतो का?
  • प्रपंच करत असतानाही परमार्थ साधण्यासाठी मी काही प्रयत्न करतो आहे का?

– क्रमशः श्लोक १३ आणि १४.

© श्री विश्वास देशपांडे

चाळीसगाव

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares