☆ श्री रविंद्रनाथ टागोर यांची “गीतांजली”… भाग – १९ ☆ डॉ. शोभना आगाशे ☆
श्री रविंद्रनाथ टागोर
मागील भागात आपण मधुरा भक्ती विषयी थोडी माहिती घेतली. या भागात भक्तीच्या याच प्रकाराविषयी आणखी काही माहिती घेऊ.
स. रा. गाडगीळ यांच्या मते मानसशास्त्रीय पध्दतीने मधुरा भक्तीचा उलगडा करणे हे चुकीचे आहे. त्यांच्या मते तो पंथ जेथे उदयाला आला, तेथील विशिष्ट परिस्थितीत अगर परंपरेत त्याची मुळे पाहणे आवश्यक आहे. चैतन्यांनंतर बंगालमध्ये विकसित झालेला वैष्णव धर्म आणि वज्रयान बौध्द पंथातून विकसित झालेला सहजिया पंथ यांनी मधुरा भक्तीचा संप्रदाय विकसित केला, असे ते मानतात. स्त्री बनल्याशिवाय खरे प्रेमरहस्य आस्वादिता येणार नाही, अशी सहजिया पंथाची धारणा होती.
पुरूषभक्ताने स्त्रीवेष धारण करण्याच्या कृतीचे स्पष्टीकरण धर्मशास्त्राच्या इतिहासात शोधण्याचे प्रयत्नही झाले आहेत. प्रारंभी मातृप्रधान संस्कृतीमध्ये स्त्रियाच देवतांच्या पुजाऱ्याचे काम करीत असत. पुढे पुरूष पुजारी बनले परंतु पुजाऱ्याने स्त्री असले पाहिजे, या विचाराचा पगडा समाजमनावर असल्यामुळे पुरूष-पुजारी स्त्रीवेषातच वावरू लागले असावेत. आपल्याकडचे पोतराज वगैरे स्त्रीवेष धारण करतातच. अशा रीतीने पुरूषाने स्त्री बनण्याची कल्पना मातृप्रधान संस्कृतीमधून मधुरा भक्तीच्या संप्रदायात आली असावी, असे एक मत आहे.
जे. जी. फ्रेझर यांनी केलेल्या नोंदीनुसार पिलू बेटांमध्ये देवी आपला पुजारी म्हणून स्त्रीची निवड करण्याऐवजी पुरूषाची निवड करते. त्या पुजाऱ्याच्या अंगात येते आणि तो पुरूष मग स्त्रीसारखा वागू लागतो अशी समजूत आहे. अमेरिकेतील अनेक आदिम जमातींमध्ये असे पुजारी आढळतात. दृष्ट लागू नये म्हणून स्त्रीवेष धारण करण्याची पध्दतही काही ठिकाणी आढळते. याच हेतूने विवाहात वधूवरांनी एकमेकांचा वेष घालण्याची प्रथाही काही समाजांत आढळते.
चैतन्य महाप्रभू हे मधुरा भक्तीचे प्रमुख प्रवर्तक होते. त्यांच्यामुळेच बंगालमध्ये हा संप्रदाय रूढ झाला. आयुष्याच्या अखेरची अनेक वर्षे ते राधारूपातच वावरत होते.
रामकृष्ण परमहंसही काही काळ स्त्रीवेषात वावरले होते. वल्लभाचार्यांच्या पुष्टिमार्गानेही मधुरा भक्तीचा जोरदार पुरस्कार केला होता.
मधुरा भक्तीचा स्वीकार करणाऱ्या विविध भक्तांनी व सांप्रदायिकांनी ललित व ललितेतर अशा दोन्ही प्रकारच्या साहित्याची निर्मिती केली. चैतन्य प्रभूंच्या रूपगोस्वामी, जीवगोस्वामी, सनातनगोस्वामी वगैरे शिष्यांनी मधुरा भक्तीचे एक तत्त्वज्ञान निर्माण केले. शांत, दास्य, सख्य, वात्सल्य व माधुर्य या भक्तीच्या पाच प्रकारांपैकी माधुर्यभक्ती सर्वश्रेष्ठ असल्याचे त्यांनी मानले. त्यांनी मधुर रसाचे एक साहित्यशास्त्रही मांडले. मधुररस हा तत्त्वत: भक्तीच्या स्वरूपाचा असला, तरी त्याच्यामधील प्रिया-प्रियकर नात्यामुळे त्याची वर्णने मात्र शृंगाररसा सारखी करण्यात आली आहेत.
गुलाबराव महाराजांचा (इ स १८८१-१९१५) अपवाद वगळता, मराठी भक्तीसंप्रदायात मधुरा भक्तीला फारसे स्थान मिळालेले नाही. गुलाबराव महाराज स्वत:ला ज्ञानेश्वरांची कन्या व कृष्णाची पत्नी मानत. तसेच स्त्रीवेष व मंगळसूत्रादि सौभाग्यचिन्हेही धारण करीत असत. अमरावती येथे त्यांच्या संप्रदायाचे ‘श्रीज्ञानेश्वर मधुरा द्वैत सांप्रदायिक मंडळ’ आहे.
भारतातील अन्य प्रांतांतूनही मधुरा भक्तीचा स्वीकार करणारे संत होऊन गेले आहेत. तमिळनाडूमधील नम्माळवार (६ वे शतक) हे त्यांपैकी एक होत. विदर्भातील देवनाथ हे कवी स्वत:ला प्रियकर व परमेश्वराला प्रेयसी मानत असत. भारतातील मूसाशाही सुहाग (१५ वे शतक) हे सूफी साधू परमेश्वराला पती मानत व स्वत: स्त्रीवेष धारण करीत असत. युरोपमधील ख्रिस्ती संतांनी परमेश्वराच्या मधुरा भक्तीचा अनुभव घेतल्याची वर्णने ही आढळतात. मुस्लिम स्त्री संत रबिया (इ स ७१७-८०१) ही परमेश्वराला पती मानून त्याची भक्ती करीत असे.
जन्मत: स्त्री असलेल्या भक्तांनी मधुरा भक्तीचा स्वीकार केल्याची उदाहरणेही आहेत. संत मीराबाई या त्यापैकी प्रमुख होत. त्या स्वत:ला ललिता नावाच्या गोपीचा अवतार आणि कृष्णाला आपला पती मानत असत. आळवार संतांपैकी आंडाळ ही रंगनाथाला म्हणजेच कृष्णाला आपला पती मानत असे. तिने रंगनाथाच्या मूर्तीचे दर्शन घेताच ती रंगनाथाशी एकरूप झाली, असे म्हणतात. दक्षिणेत अजूनही दरवर्षी तिचा व रंगनाथाचा विवाहदिन साजरा केला जातो.
याच प्रकारच्या भक्तिरसाचा अविष्कार आपल्याला ‘गीतांजली’ तील गीत क्र ५२, ५३, ५४, ५६, ५७, ५९, ७२, ७३, ७४, ८९, ९१, ९४, ९९, १०१, १०२ मध्ये कमी अधिक प्रमाणात पहायला मिळतो.
—–
☆ गीत : ५५ ☆
LANGUOR is upon your heart and the slumber is still on your eyes.
Has not the word come to you that the flower is reigning in splendour among thorns? Wake, oh awaken! Let not the time pass in vain!
At the end of the stony path, in the country of virgin solitude my friend is sitting all alone. Deceive him not. Wake, oh awaken!
What if the sky pants and trembles with the heat of the midday sun ⎯ what if the burning
sand spreads its mantle of thirst ⎯
Is there no joy in the deep of your heart? At every footfall of yours, will not the harp of
THUS it is that thy joy in me is so full. Thus it is that thou hast come down to me. O thou lord of all heavens, where would be thy love if I were not?
Thou hast taken me as thy partner of all this wealth. In my heart is the endless play of
thy delight. In my life thy will is ever taking shape.
And for this, thou who art the King of kings hast decked thyself in beauty to captivate my heart. And for this thy love loses itself in the love of thy lover, and there art thou seen in
LIGHT, my light, the world-filling light, the eye-kissing light, heart-sweetening light!
Ah, the light dances, my darling, at the centre of my life; the light strikes, my darling, the chords of my love; the sky opens, the wind runs wild, laughter passes over the earth.
The butterflies spread their sails on the sea of light. Lilies and jasmines surge up on the crest of the waves of light.
The light is shattered into gold on every cloud, my darling, and it scatters gems in
profusion.
Mirth spreads from leaf to leaf, my darling, and gladness without measure. The heaven’s river has drowned its banks and the flood of joy is abroad.
☆ मानवतेचा आणि सेवेचा प्रकाश : डॉ. प्रकाश आमटे ☆ श्री विश्वास देशपांडे ☆
परवाच्या दिवशी व्हाट्सअपवर नवीन चित्रपटासंदर्भात एक पोस्ट फिरत होती. सालार, डंकी आणि आणखी असेच काही बॉलिवूडचे मसाला चित्रपट येत असताना प्रेक्षकांनी अस्सल हिरोकडे पाठ फिरवली. हा अस्सल हिरो म्हणजे सॅम बहादूर. सॅम माणेकशॉ हे भारताचे पहिले फिल्ड मार्शल. भारतीय लष्करात चाळीस वर्षे सेवा बजावून आपल्या देशातील जवानांना आणि तरुणांना सेवेचा आदर्श त्यांनी उभा केला. तरुणाईने पाहिलाच पाहिजे असा हा चित्रपट पण हा चित्रपट मी पाहायला गेलो तेव्हा थिएटरमध्ये तुरळक गर्दी होती. पाहणारे बहुसंख्य प्रेक्षक साठी ओलांडलेले होते. असाच एक रिअल हिरो म्हणजे प्रकाश बाबा आमटे. आपल्या वडिलांचा म्हणजेच थोर समाजसेवक बाबा आमटे यांच्या सेवेचा आणि त्यागाचा वारसा पुढे चालवणाऱ्या त्यांच्या विकास आणि प्रकाश या दोन सुपुत्रातील द्वितीय. हा द्वितीय पुत्र तसा एकमेवाद्वितीयच म्हणावा लागेल. बाबा आमटे कुष्ठरोग्यांसाठी कार्य सुरु करतात. एक दिवस आपल्या मुलांसह भामरागडच्या जंगलात सहलीसाठी म्हणून जातात. भामरागडचे जंगल हे जाण्यासाठी अत्यंत गैरसोयीचे. रस्ते नीट नाहीत, दळणवळण सुविधा नाहीत. आरोग्याच्या सोयी तर नाहीतच पण जंगलातील माडिया, गोंड यासारखे आदिवासी तर आरोग्य आणि शिक्षण यांच्याबद्दल काडीचीही आस्था नसलेले. अशा वेळी बाबांना प्रश्न पडतो. मी तर आनंदवनात कुष्ठरोग्यांसाठी कार्य सुरु केलंय पण अशा बिकट ठिकाणी माझ्या आदिवासी बांधवाना कोण सेवा देणार? त्यांच्या मनातील खंत जाणून घेऊन नुकताच डॉक्टर झालेला प्रकाश म्हणतो, ‘ मी करीन इथे काम. ‘ बाबांच्या चेहऱ्यावर आनंद झळकतो.
एम बी बी एस झालेला, डोळ्यात भविष्याची स्वप्ने तरळत असलेला हा तरुण निश्चय करतो आदिवासींच्या सेवेचा. त्याच्यासाठी हे काम अजिबात सोपं नसतं. गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुका आणि त्या तालुक्यातील हेमलकसा हे ठिकाण. इथे सुरु होतो लोकबिरादरी प्रकल्प. या क्षेत्रात माडिया, गोंड आदी आदिवासी जमातींचा निवास. त्यांची भाषा वेगळी. राहणी तर कमालीची साधी. अंगावर पुरेसे वस्त्रही नाही. शिकार करून मिळेल ते खायचे. नाही मिळाले तर उपाशी राहायचे. कुपोषित बालके जन्माला येणं ही तर जणू काही इथली परंपराच! त्यातील काही योगायोगाने जगायचे आणि पुढे अनेक आजारांचे शिकार व्हायचे. बाळंतपणत होणारे मृत्यूही भरपूर. त्यांना कोणी काही सांगू गेले किंवा शिकवू गेले तर, त्या माणसाला ते आपला शत्रू समजायचे अशी सगळी परिस्थिती.
अशा भयाण परिस्थितीत प्रकाशाची एक छोटीशी पणती तेवत होती ती प्रकाश आमटेंच्या रूपाने. जंगलामध्ये एक छोटीशी झोपडी उभारली गेली. या झोपडीला दारही नव्हते. प्रकाश यांची सहधर्मचारिणी मंदाताई या झोपडीतच त्यांच्यासवे आल्या. त्याही डॉक्टर होत्या. पण त्यांनीही आपल्या पतीसमवेत सेवाकार्यात स्वतःला झोकून दिले. आदिवासींमध्ये काम करणे सोपे नव्हते. अशा बाहेरच्या व्यक्तींना स्वीकारायला आदिवासी अजिबात तयार नव्हते. त्यासाठी या दाम्पत्याला त्यांची भाषा शिकावी लागली. त्यांच्याप्रमाणेच साधी राहणी ठेवावी लागली. हळूहळू त्या लोकांचा विश्वास या दाम्पत्यावर बसू लागला. ही माणसे आपल्याला मदत करण्यासाठीच आली आहेत अशी त्यांची खात्री झाली. लोकबिरादरी प्रकल्प मार्गी लागला. आदिवांसीसाठी दवाखाना, शाळा सुरु झाली.
४ नोव्हेंबर २०१९ हा तो दिवस. याच दिवशी या सेवाव्रतींचे दर्शन आम्हाला घडले. त्या दिवशी आम्ही हेमलकशाला गेलो होतो. भेटीसाठी प्रकाश आमटेंची वेळ मिळाली होती. प्रकाश आमटे आणि मंदाताई भेटणार म्हणून कोण आनंद झाला होता. माझ्यासारखेच इतरही काही पर्यटक प्रकाश आमटेंचं सेवाकार्य आणि लोकबिरादरी प्रकल्प पाहण्यासाठी आले होते. एका मोठ्या हॉलमध्ये आम्ही बसलो होतो. एवढ्यात डॉ प्रकाश आणि मंदाताई आल्या. त्यांच्या राहण्यातला साधेपणा, वागण्याबोलण्यातली अकृत्रिमता लक्ष वेधून घेत होती. आमच्याशी त्यांनी काही वेळ संवाद साधला. त्यावेळी माझं ‘ कवडसे सोनेरी… अंतरीचे ‘ हे पुस्तक नुकतेच प्रकाशित झालं होतं. ते पुस्तक त्यांना भेट देण्याचं भाग्य मला लाभलं. डॉ प्रकाश यांनी लोकबिरादरी प्रकल्पाची माहिती आम्हाला दिली. आणि मग स्वतः आमच्यासोबत येऊन त्यांचे प्राणी अनाथालय त्यांनी आम्हाला दाखवले. प्राण्यांबरोरबर ते संवाद साधत होते. त्यांच्याशी बोलता बोलता त्यांना भरवत होते. ते मुके जीव सुद्धा आपल्यावर जीवापाड प्रेम करणाऱ्या या देवमाणसाला अत्यंत प्रेमाने प्रतिसाद देत होते.
डॉ प्रकाश यांचं प्राणीप्रेम, त्यांना घराच्या एखाद्या सदस्यासारखं सांभाळणं या सगळ्या गोष्टी आम्ही त्या थोड्या वेळात अनुभवल्या. त्यांचं हे प्राणी अनाथालय कसं सुरु झालं याची हकीकत रोमहर्षक आणि हृदयस्पर्शी आहे. जंगलात राहणारे आदिवासी जो प्राणी दिसेल, त्याची शिकार करून खात.
शक्यतो वानरांची शिकार कोणी करत नाही पण एकदा काही आदिवासी माणसे एका वानरीणीची शिकार करून तिला घेऊन जात होते. वानरी मृत झाली होती पण तिचे पिलू जिवंत होते. ते तशाही अवस्थेत तिचे दूध पिण्याचा प्रयत्न करीत होते. कोणत्याही सहृदय व्यक्तीचे मन हेलावून टाकणारे ते दृश्य होते. प्रकाश यांचीही अवस्था काही वेगळी नव्हती. त्यांनी त्या आदिवासींना त्या पिलाला सोडून द्या म्हणून विनंती केली. पण ते म्हणाले की आमच्या लेकरांना खायला काय द्यायचे? तेव्हा डॉ प्रकाश यांनी त्यांना डाळ तांदूळ दिले. तेव्हा आदिवासींनी ते पिलू त्यांच्या हवाली केले. ही त्यांच्या प्राणी अनाथालयाची पहिली सुरुवात होती. पुढे मग जंगलात सापडलेली अनाथ पिले आदिवासी डॉ प्रकाश यांना आणून देऊ लागले. आपल्या आईलाही ज्यांनी पाहिले नाही अशा या अनाथ पिलांना आईची माया डॉ प्रकाश यांनी दिली.
हेमलकसा इथे साधारणपणे १९७४ च्या सुरु झालेल्या लोकबिरादरी प्रकल्पाला आता ५० वर्षे पूर्ण झाली आहेत तर २६ डिसेंबर हा डॉ प्रकाश यांचा जन्मदिवस. आता त्यांचं वय सुमारे ७६/७७ वर्षे असावं. या दरम्यान जीवनातील खूप चढउतार या दाम्पत्याने अनुभवले आहेत. शून्यातून विश्व निर्माण करणं म्हणजे काय असतं याचा मूर्तिमंत आदर्श म्हणजे आमटे कुटुंब. तोच वारसा डॉ प्रकाश आणि मंदाताई यांनी पुढे चालवला. अनेक आदिवासींना मोफत वैद्यकीय सेवा पुरवली. त्यांच्या शिक्षणाची व्यवस्था केली. त्यांची पुढची पिढीही हा वारसा जपते आहे, पुढे नेते आहे. आपल्या परिसरातील रुग्णांची सेवा करता करता डॉ प्रकाश याना गेल्या वर्षी एका दुर्धर आजाराचा सामना करावा लागला पण सेवाकार्याची पुण्याई पाठीशी असल्याने त्यातूनही ते सुखरूप बाहेर पडले. आदिवासींची सेवा करताना त्यांनी भेदभाव केला नाही. अनेक नक्षलवाद्यांवरही त्यांनी उपचार केले, त्यांचे समुपदेशन केले. भ्रष्ट आणि लाचखोर अधिकाऱ्यांची दूर रवानगी केली.
हेमलकसा येथील शाळा सुद्धा पाहण्यासारखी आहे. अनेक आदिवासी विद्यार्थी या शाळेत जीवनाचे धडे गिरवत आहेत. केवळ पाठ्यपुस्तकी शिक्षण त्यांना इथे दिले जात नाही. शेती करणे, निरनिराळे उद्योगव्यवसाय करणे, निरनिराळी कौशल्ये हस्तगत करणे या गोष्टी त्यांना शिकवल्या जातात. जीवनमूल्ये शिकवली जातात. या विद्यार्थ्यातून अनेक विद्यार्थी शिकून मोठे होऊन आज मोठमोठ्या पदांवर पोहोचले आहेत, तर काही आपल्या आदिवासी बांधवांची सेवा करत आहेत. डॉ प्रकाश आमटे म्हणतात, ‘ मी तर केवळ निमित्तमात्र आहे. हे सगळे टीमवर्क आहे. मला सेवाभावी कार्यकर्ते मिळाले म्हणून एवढे मोठे कार्य करणे शक्य झाले. ‘ त्यांचे हे उद्गार त्यांची नम्रता दर्शवतात. डॉ प्रकाश आणि डॉ मंदाताई यांना मॅगसेसे पुरस्कारासह अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार आपल्या कार्यासाठी प्राप्त झाले आहेत. त्यांच्यामुळे या पुरस्काराना मोठेपण लाभले आहे. त्यांनी लिहिलेली ‘ प्रकाशवाटा ‘ आणि रानमित्र ही पुस्तके प्रसिद्ध आहेत. त्यांच्या जीवनाचे यथार्थ दर्शन घडवणारा ‘ डॉ प्रकाश बाबा आमटे- द रिअल हिरो ‘ हा सुंदर चित्रपट आहे. यात नाना पाटेकर यांनी डॉ प्रकाश आमटे यांची भूमिका साकारली आहे. त्या चित्रपटातील गुरु ठाकूर यांनी लिहिलेलं गीत अतिशय अर्थपूर्ण आणि सुंदर आहे.
तू बुद्धी दे, तू तेज दे, नवचेतना विश्वास दे,
जे सत्यसुंदर सर्वथा आजन्म त्याचा ध्यास दे
अशाच ‘सत्यसुंदराचा ध्यास घेतलेल्या’डॉ प्रकाश आमटे यांना आणि त्यांच्या कार्याला शतशः प्रणाम!
☆ समईच्या शुभ्र कळ्या… – लेखक : पं. हृदयनाथ मंगेशकर ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆
(भाऊ-बहीण यांचं नातं मायेच्या ओलाव्याचं, नितळ आणि प्रेमानं ओथंबलेलं. थोरली बहीण आशा भोसले यांच्याविषयी लिहिताना पंडित हृदयनाथ मंगेशकर यांची प्रतिभा विलक्षण उंची गाठते. पंडित हृदयनाथ यांचा हा विशेष लेख)
‘संध्येची वेळ, पत्थरानी चढणित घर राहिले रे दूर…’ कविवर्य भा. रा. तांबे यांच्या कवितेसारखी स्थिती…दहा वर्षांची आशाताई मला कडेवर घेऊन धुळीनं, म्हणजे फुपाट्यानं, भरलेल्या रस्त्यानं चालत होती. दुपारच्या उन्हानं तापलेला रस्ता अजूनही आपले उष्ण श्वास सोडत होता.
कडेवर पाच वर्षांचा भाऊ आणि एका हातात नदीवर धुतलेल्या कपड्यांचे पिळे घेऊन ही फक्त दहा वर्षांची आशाताई…उपाशीपोटी, अजाण आशाताई त्या खडकाळ तापलेल्या रस्त्यानं आनंदात चालत होती.
आलेल्या परिस्थितीला हसत तोंड देणं हा दैवी गुण तिला लहानपणापासूनच मिळाला होता. एका बाजूला एक पडका किल्ला, एका बाजूला तापी नदीचा भीतिदायक खोल डोह आणि पुरात नदीनं कापलेले बिहड आणि फुफाट्याचा एकाकी रस्ता…ही निर्भय पोरगी अगदी आरामात चाललेली होती. नेटका सुंदर चेहरा, सरळ नाक,
जाड; पण सुबक ओठ, अगदी निष्पाप डोळे, भोळा भाव असलेले; पण मोठे, गालाला गोड खळ्या, सावळा रंग, अतिशय प्रमाणबद्ध दणकट शरीर, बाबांचं (मा. दीनानाथ) सारं सौंदर्य, स्वभाव आणि मुख्यतः गाणं घेऊन आशाताई जन्माला आली होती. बाबा गायला बसायचे. समोर दीदी (लता मंगेशकर), तिच्या बाजूला मीनाताई आणि बाबांचे निवडक शिष्य रियाज करायचे आणि आशाताई? ती एकतर खेळत असायची किंवा आईला मदत करत असायची.
एकदा आईनं चिंतेनं विचारलं : ‘‘मालक, ही आशा नुसती खेळत असते. ही केव्हा गाणार?’’
बाबा शांतपणे म्हणाले : ‘‘काळजी करू नकोस. ती खेळता खेळता गाणं शिकत असते आणि गाणं शिकवून येतच नाही; त्याला दैवी देणगी असावीच लागते. हिला ती दैवी देणगी आहे आणि स्वभावानं ती ‘हब’ आहे. (‘हब’ म्हणजे म्हैस).
ती प्रेमळ आहे, भोळी आहे; पण कुणी अंगावर आलं तर त्याला शिंगावर घेण्याची शक्ती तिच्यात आहे. वेळ आली की धडक देऊन ती अचानक गायला सुरुवात करेल आणि ‘मी मी’ म्हणणारे तिच्यापुढं लोटांगण घालतील असं ती गाईल; पण श्रीमती, हिचा भोळा स्वभाव? मला चिंता वाटते. बघू पुढं काय होते ते.’’
माझं आणि धुतलेल्या कपड्यांचं ओझं घेऊन आशाताई घरी पोहोचली. मला ओट्यावर बसवून ती कपडे वाळत घालू लागली… ..
‘‘ए आजी, भूक लागली आहे. काही खायला आहे?’’
म्हातारी आजी ताईबाई म्हणाली : ‘‘आशा, जेवून गेली होतीस ना? मग या वेळी तुला भूक का लागली?’’
‘‘ताई, सारे कपडे धुतले…वाळत घातले…सारी भांडी धुतली…सारं घर सारवलं…बाळला कडेवर घेऊन आताच तापीवरून आले आणि मग भूक नाही का लागणार?’’
‘‘बरं, मीच चुकले. आत भाकरी आणि तिखट-तेल आहे, लोणचंही आहे. खाऊन घे…पण आशा, लवकर जेवून घे. आज जडीबाई (शेजारीण) येणार आहे. थोडं गाऊ या.’’
मग जडीबाई आणि गावातल्या बायका यायच्या. संध्याकाळचं गार वारं सुखावू लागायचं. पाखरं घरी जाण्याच्या तयारीत किलबिल करायची. मग ताईबाई, आशाताई, उषाताई गायला सुरुवात करायच्या.
‘यशोदे घराकडे चाल .. मला जेवू घाल
आई दही वाढ दही .. वर कांद्याची कोशिंबिरी
पाई पडलिया फुटा .. झिजली नखं
मला जेवू घाल.’
त्या अत्यंत मागासलेल्या खेड्यातल्या त्या जीर्ण घरात हे सगळं अतिकरुण वाटायचं. आशाताईच्या गळ्यातला हा करुण रस या खेड्यातल्या उपासमारीच्या आणि कामाच्या ताणामुळं समृद्ध झाला. त्यात युद्धाच्या काळात आलेलं दारिद्र्य सारं गाव भोगत होतं. त्यात खरूज या आजाराची साथ. खरजेनं आशाताईचं सारं अंग भरलेलं. माझंही. नुसत्या वेदना. या वेदनेनं शरीर नाही; पण भावजीवन समृद्ध झालं. पुढील संगीताच्या वाटचालीत या भोगलेल्या यातनांचा फार उपयोग झाला.
‘‘आशा, ते छल्ल्याचं गाणं गा. जडी, ही कशी ठसक्यात गाते, ते ऐक.’’
.. .. मग आशाताई गायला सुरुवात करायची… ..
‘मेरा छल्ला जो गम गया
ढूँढो जमादार
नको, नको जमादार
मेरे छल्ले के खातीर
मै तो तोडे बनाऊँगा
नको नको जमादार
मेरी छल्ला जो गम गया
ढूँढो जमादार.’
मग अशी अनेक लोकगीतं आशाताईला त्या थाळनेर गावी पाठ झाली.
‘‘आशाताई, तुझ्यासाठी एक खास गाणं तयार केलं आहे. अर्थात्, ‘एचएमव्ही’साठी. पैसे मिळणार नाहीत; पण रॉयल्टी मात्र मिळेल.’’
‘‘बाळ, मी फार कामात आहे. पैशाचा प्रश्नच नाही; पण मला वेळच नाही.’’
‘‘ठीक आहे, गाणं ऐकून घे. आवडलं तर वेळ मिळाल्यानंतर गा.’’
‘‘बरं गा, मी ऐकते.’’
मी गायला सुरुवात केली…
‘‘जिवलगा ऽऽऽ राहिले रे दूर घर माझे
पाउल थकले, माथ्यावरचे जड झाले ओझे
जिवलगाऽऽऽ’’
‘‘बस्स कर, थांब! थाळनेरमधले सारे भोग या गाण्यात उतरले आहेत. तुला कडेवर घेऊन उपाशीपोटी मी अशीच चालायची! बाळ, मी फिल्मची दोन गाणी रोज गाते आणि गातच राहणार; पण माझ्या जीवनाचं दर्शन घडवणारं हे गाणं मी इतर गाणी सोडून गाणारच. चल! आपण रिहर्सल करू या.’’
‘‘पण आशाताई, या गाण्यामध्ये अंतऱ्यासाठी संगीताचे तुकडे नाहीत. हे अनुभवनिष्ठ, दृष्टान्त देणारं गाणं आहे. गायिका फक्त आपल्या ‘जिवलगा’साठी गात आहे. गायिका, जिवलग, निसर्ग आणि जीवघेणी संध्याकाळ…या गाण्यात कुणालाही प्रवेश नाही.
“ ‘‘जिवलगाऽऽऽ’ म्हणजे प्रियकर असं मुळीच नाही. जिवलगा ही एक आर्त हाक आहे, एक जीवघेणी पुकार आहे. ही आर्त हाक कुणासाठी आहे हे ज्यानं त्यानं आपल्या जीवनानुभूतीनं ठरवावं. संगीतकार, कवी, गायिका हे या जिवलगाच्या आर्त हाकेचे केवळ माध्यम आहेत.’’
एक दिवस आशाताईचा आईला फोन आला : ‘‘माई, मी फार त्रासात आहे. तू लवकर मला इथून बाहेर काढ.’’
माई घाबरली. म्हणाली : ‘‘चल बाळ, आशाला घरी आणू या. ती फार त्रासात आहे.’’
मग मी, आई, अर्जुन (माझा खास मित्र) असे तिघं आशाताईच्या घरी पोहोचलो. आशाताई आणि भोसले भांडत होते. आई त्यांना समजावत होती; पण कुणीच ऐकत नव्हतं. अचानक आशाताई घर सोडून निघून गेली. आठ महिन्यांची गरोदर बाई घर सोडून निघून गेली. मी बंगल्याखाली मोटारीत बसलो होतो.
माझ्यासमोरच आशाताई टॅक्सीत बसून निघून गेली. आई भोसलेंना समजावत बसली. तेवढ्यात मला आशाताईची मुलगी वर्षा दिसली. आशाताईचीच कॉपी…तसंच नाक, तोच रंग, त्याच खळ्या, तेच निष्पाप भोळे डोळे.
.. .. लहान आशाताई माझ्याकडं पाहत होती! मी काहीही विचार न करता गच्चीवर गेलो. वर्षाला उचललं आणि मोटारीत घालून वाळकेश्वर इथं घरी आलो. वर्षा इतकी लहान होती की ती मला आपला बापच समजली. लग्नाआधीच मी तीन वर्षांच्या मुलीचा बाप झालो.
थोड्या वेळानं आशाताई घरी आली. दोघी बहिणी खूप रडल्या.
‘‘आशा, आता तू इथंच माझ्या खोलीत राहा. बघू, तुझ्या केसाला कोण धक्का लावतंय.’’
‘‘पण दीदी, माझा हेमंत, वर्षा हे सारे इथंच राहतील?’’
‘‘अगं, हे तुझं घर आहे, जिथं आम्ही तिथं तू, जिथं तू तिथं तुझी मुलं. मी लता मंगेशकर, तू आशा भोसले…काय कमी आहे आपल्याला?’’ दीदी आशाताईला मिठीत घेत म्हणाली.
मग आशाताई निश्चिंतपणे ‘वाळकेश्वर हाऊस’ इथं आमच्याबरोबर राहू लागली. वर्षा मला सोडून राहायचीच नाही. मी तिचे सारे लाड पुरवत होतो. एक दिवस आई, दीदी, उषाताई कोल्हापूरला गेल्या. गरोदर आशाताईची जबाबदारी माझ्यावर येऊन पडली.
मी थोडा अस्वस्थ झालो. कारण, आशाताई गरोदर होती आणि माझी अनामिक भीती खरी झाली. आशाताईला टायफॉईड झाला. डॉक्टरांनी सांगितलं : ‘चौदा दिवस बेडरेस्ट. पलंगावरून हलायचं नाही. कारण, पोटात गर्भ आहे.’ मी डॉक्टर कपूर यांना म्हणालो : ‘‘डॉक्टर, मी कसं सांभाळणार आशाताईला? ती गरोदर आहे आणि तिला विषमज्वर झाला आहे. तिची औषधं, पथ्यपाणी वगैरे मी कसं सांभाळणार?’’
डॉक्टर म्हणाले : ‘‘काळजी करू नका. आशाताई दणकट आहे. ती या आजारातून सहज बाहेर येईल. मी एक नर्स पाठवून देतो. ती सर्व औषधपाणी सांभाळेल.’’
मी सुटकेचा निःश्वास सोडला. मग नर्स आली. तिनं सारी जबाबदारी घेतली; पण संध्याकाळी, रात्री द्यायच्या औषधांची यादी आणि वेळा सांगून गेली. मीही फार विचार न करता तिला ‘हो’ म्हणालो. वेळेप्रमाणे औषध देऊ लागलो. शेवटचं औषध पहाटे पाचला होते. मी सूर्यवंशी… पहाटे कसा उठणार? मी जागतच बसलो.
असे चार दिवस गेले. आशाताई बरी होत होती; पण मी मात्र किंचित वेड्यासारखं बोलत होतो. माझा मित्र अर्जुन यानं मला सांगितलं, ‘तू असंबद्ध बोलत आहेस…’ मग माझ्या लक्षात आलं की, मी रोज रात्री जागरण करतोय, दिवसाही झोपत नाही…मग मी आशाताईला म्हणालो : ‘‘आज सकाळची औषधाची गोळी तू घे. आज मी जरा झोपतो.’’
आशाताई म्हणाली : ‘‘मी तुला सांगत होतेच की, इतका जागू नकोस; पण तू ऐकतोस कुठं? जा, झोप जा. मी वेळेवर औषध घेईन.’’
मग मी झोपायला गेलो; पण झोप येईच ना. बऱ्याच वेळानंतर डोळ्यांवर झापड येऊ लागली आणि माझा गतकाळात प्रवेश झाला :
ते पुणं…ते घर…ती रेवडीकरांची गल्ली… तो राजा गडी…
‘‘आशा, बाळला घे…मघापासून रडतोय बघ! काही तरी खेळव त्याला.’’ आईचा हळवा आवाज आला.
‘‘बघते आई, तू काळजी करू नकोस,’’ आशाताई मला कडेवर घेत म्हणाली. बाबांचा मृत्यू होऊन एक महिना झाला असावा. दीदी कामाला लागली होती. मीनाताई पोटाच्या विकारानं त्रस्त होती. उषाताई लहान. मग मला कडेवर कोण घेणार? आशाताई. कारण, शरीरानं ती दणकट होती; पण मला कडेवर का घ्यावं लागायचं?
कारण, मला चालता, अगदी रांगताही, येत नव्हतं. बोन टीबी म्हणजे हाडेव्रण झाला होता. पायात दूषित रक्त भरलं गेलं होतं. दिवस-रात्र फक्त वेदना आणि आक्रोश. आशाताईला हे कळत होतं. म्हणून ही माझी दुसरी आई मला सतत कडेवर घेऊन काम करायची.
खरंही वाटणार नाही; पण आशाताई मला कडेवर घेऊन झाडून घेणं, भांडी घासणं, कपडे धुणं ही सारी कामं करायची. पुढं मी सिंदबादची गोष्ट वाचली. तो म्हातारा, सिंदबादच्या खांद्यावरून उतरतच नाही. त्या म्हाताऱ्यासारखा मी आशाताईच्या कडेवरून उतरतच नसे. किती सेवा केली तिनं माझी! कसं उतरणार हे ऋण?
एखाद्या माणसाच्या नशिबात नियती असं गमतीदार; पण करुण भविष्य लिहून जाते की आश्चर्यच वाटतं. आशाताईचं प्रारब्ध असं काही विचित्र आहे…दणकट शरीर मिळालं; पण लहानपणापासून शारीरिक कष्ट सतत भोगावे लागले. गुणी मुलगी आणि प्रतिभावान मुलगा देवानं तिच्या ओटीत टाकला.
ती दोन्ही मुलं अल्पायुषी ठरली…आशाताईनं प्रेमविवाह केला. तो प्रियकर विक्षिप्त निघाला. लाथा, शिव्या, मार खातही अमर गाणी तिनं गायिली. अलीकडं मी टीव्ही पाहतो. तेव्हा, भारत सरकार ‘भारतरत्न’ ही पदवी खिरापतीसारखी वाटते आहे, हे मला काही दिवसांपूर्वी बातम्यांमधून कळलं…पण जगताला ७० वर्षं संगीतकलेचा प्रत्यय देणाऱ्या, नव्वदी उलटलेल्या एकमेव आशा भोसले यांना सरकार का विसरतं? नियती! आणि, दुसरं काय?
बाबा गेल्यानंतर आम्ही कोल्हापूरला गेलो. नुसते हाल. चुरमुऱ्यात पाणी घातलं की आमचं जेवण झालं. नुसतं दैन्य, वेदना, अवहेलना. बाबांचं श्राद्ध आलं की, बाबांचं एक चांदीचं ताट आई विकायची. ते ताट आणि मी कडेवर…अशा थाटात एप्रिल महिन्याच्या उन्हात आशाताई गुजरी गल्लीत जायची.
ते ताट विकून जे पैसे यायचे त्यांतून श्राद्ध करण्यास लागणारं सारं सामान घेऊन ती घरी यायची. मग आई, मीनाताई, आशाताई स्वयंपाकाला बसायच्या. गावातली एक समजूत की, श्राद्ध या कर्माला २१ भाज्या लागतात. मग या बायका २१ भाज्या करण्याचा खटाटोप करायच्या. मग दुसऱ्या दिवशी भटजींना दक्षिणा देऊन आम्ही पाची भावंडं गच्चीच्या तापलेल्या पत्र्यावर उभे राहून उपाशीपोटी, कावळा घासाला केव्हा शिवतो, याची वाट बघत राहायचो.
का कुणास ठाऊक, मी या कर्मकांडाच्या विरुद्ध झालो. थोडीफार आशाताईही या कर्मकांडाच्या विरुद्ध आहे. या कोल्हापुरात प्लेगची साथ आली आणि आम्ही थाळनेरला गेलो. ही खानदेशची राजधानी…पण नगण्य खेडं.
तिथं आशाताईच्या आणि माझ्या अंगावर खरूज या आजारानं हल्ला केला. सर्व अंग रक्ताळायचं. त्या वेदनामय आजारात आशाताई दीड-दोन मैल (किलोमीटरची भाषा त्या वेळी नव्हती) चालत तापी नदीवर आंघोळ करून, सगळ्यांचे कपडे धुऊन घरी यायची. मला सदैव कडेवर घेऊन.
मग आम्ही मुंबईला आलो. आता थोडे बरे दिवस आले होते. मी चालूही लागलो होतो. एक दिवस उग्र मुद्रेनं आशाताई भिंतीला टेकून उभी होती. आई तिच्यावर ओरडत होती. आशाताई निगरगट्टपणे उभी होती.
मग कळलं की, आशाताई घर सोडून गेली प्रियकराबरोबर. सगळ्यात जास्त धक्का मला बसला. आता आशाताई कधीही दिसणार नाही…मी उन्हात दुपारी रस्त्यावर उभा राहायचो आणि प्रत्येक मोटारीत बघायचो. कारण, माझ्या मित्रांनी मला सांगितलं होतं की, आशा या रस्त्यानं जाते. बरेच दिवस मी उन्हात उभा राहिलो; पण आशाताई दिसली नाही.
‘तुझ्याच साठी कितीदा… ऊन्ह सोशिले माथी रे, तुझ्याच साठी रे…’
कविवर्य ना. घ. देशपांडे यांची ही कविता मला वाचवेना. आताही मला झोप येईना. कारण, हा सारा भूतकाळ माझी झोप घेऊन गेला होता.
आशाताई बरी झाली आणि मुलाला जन्म देण्यासाठी रुग्णालयात गेली. दोन दिवसांनी तिनं एका सुंदर मुलाला जन्म दिला. सगळे आनंदानं वेडे झाले; पण आशाताईच्या नवऱ्यानं रुग्णालयाला धमकी दिली. बायकांचं रुग्णालय ते.
साऱ्या बायका घाबरल्या. आशाताई एक दिवसाची बाळंतीण; पण तिनं धैर्यानं त्या रुग्णालयाच्या संचालिकेला सांगितलं की, ‘तुम्ही काळजी करू नका. मी आत्ता घरी जाते.’ आणि, एका दिवसाच्या मुलाला घेऊन आशाताई घरी आली; पण जिना कसा चढणार?
मग मी, अर्जुन, हिरालाल यांनी आशाताईला खुर्चीवर बसवलं आणि आम्ही तिघांनी आशाताईला तिसऱ्या मजल्यावर नेलं. मी आशाताईला गमतीनं म्हटलं : ‘‘आशाताई, इतके दिवस तू मला खांद्यावर मिरवलंस…आज मी तुला खुर्चीवर बसवून मिरवलं.’’
दीदीनं मुलाचं नाव ठेवलं : ‘आनंद.’
‘‘आशाताई, आपला प्रयोग असलेलं ‘जिवलगा…’ हे गाणं मैफलीत शास्त्रीय संगीतकारही गायला लागलेत…मोठे समीक्षकही ‘जिवलगा’वर समीक्षा लिहीत आहेत. सर्वसाधारण श्रोत्यांना हे गाणं फार आवडलं आहे. आता एक नवा प्रयोग करतोय, गूढकाव्य स्वरबद्ध करतोय. तूच या गाण्याला न्याय देऊ शकशील याची मला खात्री आहे. गाणार का?’’
आशाताई हसली. म्हणाली : ‘‘प्रयोग असला की तुला माझी आठवण येते, नाही?’’
मी पहिल्यांदाच गंभीरपणे म्हणालो : ‘‘आशाताई, तुझी यासाठी आठवण येते; कारण, नियती आपल्या सहनशीलतेवर एक प्रयोगच करत होती. त्या प्रयोगाचे फक्त दोन साक्षीदार आहेत…तू आणि मी.’’
‘‘बरं, गाणं ऐकव,’’ आशाताई गहिवरून म्हणाली.
मी गाणं ऐकवलं.
‘‘फार छान चाल आहे. गाणाऱ्याला एक आव्हान आहे या चालीत; पण बाळ, काव्य ओ की ठो कळलं नाही आणि कळणारही नाही; पण मी हे गाणं गाणार.’’
‘‘नाही आशाताई, अंधारात बाण मारू नकोस. मी उद्या कवी आरती प्रभूंकडून याचा अर्थ नीट समजावून घेतो आणि तुला लिहून देतो. त्या अर्थामध्ये एकाकार होऊन मगच हे गाणं गा.’’
दुसऱ्या दिवशी मी तो कागद आशाताईला दिला. आशाताई ते गाणं गायिली.
नव्वद वर्षांची आशाताई नुकतीच मला भेटली. जुन्या आठवणी निघाल्या. एकदम हरवून म्हणाली : ‘‘बाळ, तुझी इतकी गाणी मी गायिले…अवघड, अनवट अशी गाणी. ‘जिवलगा…’, ‘केव्हातरी पहाटे…’, ‘तरुण आहे रात्र अजुनी…’, ‘मी मज हरपुन बसले गं…’, ‘मागे उभा मंगेश’, ‘जांभुळपिकल्या झाडाखाली…’, ‘नभ उतरू आलं…’ ही सगळी गाणी फार लोकप्रिय झाली; पण तुझं ते गाणं – जे कुणालाच पसंत नव्हतं ते गाणं – मी तुझ्या सर्व गाण्यांत उत्कृष्ट नव्हे, उत्कट गायिले, असं मला ठामपणे वाटतं.’’
ते गाणं अर्थासहित :
समईच्या शुभ्र कळ्या उमलवुन लवते
केसातच फुललेली जाई पायाशी पडते
भिवयांच्या फडफडी दिठीच्याही मागे पुढे
मागे मागे राहिलेले माझे माहेर बापुडे
साचणाऱ्या आसवांना पेंग येते चांदणीची
आजकाल झाले आहे विसराळू मुलखाची
थोडी फुले माळू नये डोळा पाणी लावू नये
पदराच्या किनारीला शिवू शिवू उन गं ये
हासशिल हास मला मला हासूही सोसेना
अश्रू झाला आहे खोल चंद्र होणार का दुणा…
रामप्रहर होतो, कळ्यांना बहर येतो. त्या कळ्यांचा आकार कसा असतो? झाडाच्या डहाळीवर झोके घेत असलेली कळ्यांची लडी… समईच्या कोन्यावर झुलत असलेली शलाका…अनेक रंगांच्या जटा धारण केलेली धवलशुभ्र ज्योत ही समईवर उगवलेली मोगऱ्याच्या एक कळी भासते…
समईच्या वाती प्रज्वलित केल्या, त्या वेळी त्या नव्हाळीनं उभ्या होत्या; पण आता फार वेळ गेल्यामुळं त्या कोमेजल्या आहेत. त्या वाती मान लववून आहेत. रात्री केसात माळलेल्या कळ्या, उमलून केसातच फुलून आता कोमेजून पायाशी पडल्या आहेत. म्हणजे, रामप्रहर झाला आहे…दिठी म्हणजे दृष्टी.
विश्वाचं दर्शन घडवणारा तेजोपट…तेज म्हणजे प्रकाश…माझी अस्वस्थता माझ्या भिवयांच्या फडफडीतून व्यक्त होत आहे. त्या फडफडीचा वेग इतका विलक्षण आहे की, त्या वेगानं माझ्या दिठीच्या वेगाला अडथळा येतोय.
म्हणजे, माझ्या भिवयांची तडफड प्रकाशाच्या वेगालाही मागं टाकतेय आणि हा सारा जीवघेणा खेळ, माझं मागं मागं राहिलेलं माहेर बापुडपणे बघत आहे. मी सासुरवाशीण आहे म्हणून हे निमूटपणे भोगत आहे. काय भोग आहेत हे की जे अव्यक्त असावेत? इतकी रात्र झाली आहे. चांदणं चहूकडं पसरलं आहे. कालही झोप लागली नाही. आजही तीच अवस्था.
‘दिन तैशी रजनी झाली गे माये’
झोप नाही; पण पेंग येते…पण डोळ्यांत अश्रू साचल्यानं डोळे अर्धवट उघडे राहतात. त्या अश्रूंत चांदण्यांचं प्रतिबिंब पडतं…डोळ्यांना चांदणीची पेंग? नुसते डोळे मिटले की त्यांत अवकाश सामावलं हेही साधं उमजत नाही. डोळे बंद करण्याचं स्मरणच होत नाही. मुलखाची विसराळू झालेय, झालं!
माळायची आहेत तर थोडी फुलं माळू नयेत. साऱ्या रात्रभर पुरतील इतकी फुलं घ्यावीत. अहो! रात्र सरली पाहिजे ना…
झोप येते म्हणून डोळां पाणी लावू नये. झोप न येऊ देण्याचं काम अश्रू करताहेत ना!
रात्री फुलं माळायचं काम उजाडल्यावर संपलं. पदराच्या किनारीला सकाळचं ऊन्ह शिवायला लागलं. माझी ही दयनीय अवस्था पाहून तुला हसू येतंय ना? खरंय…तुला हसू येणारच. तुझं अस्तित्व मी उदरात जोपासते आहे ना! पण खरं सांगू?…मला तुझं हसू सोसत नाही. तुझ्या-माझ्यासारखा एका जिवाला मी जन्म देणार आहे.
मी बाळाला अंगावर पाजणार…एक शरीर माझ्या शरीरात जगतंय…मी जन्मदात्री माता, आई होणार…ही जाणीव इतकी विलक्षण आहे की, मी हादरून गेले आहे. माझी अवस्था तुम्हा पुरुषांना कळणारच नाही. अरे, माझा अश्रू खोल झाला आहे. त्याला करुणेचे, दुःखाचे, मायेचे कंगोरे आहेत. ‘जब आँख ही से न टपका तो फिर लहू क्या है?’ आता मी रूपांतरित होणार आहे आणि चंद्रही दोन होणार आहेत.
┉❀꧁꧂❀┉
लेखक : पं. हृदयनाथ मंगेशकर
प्रस्तुती : श्री सुहास रघुनाथ पंडित
सांगली (महाराष्ट्र), मो – 9421225491
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ “समिधाच सख्या या!!” – लेख क्र. २. ☆ प्रा.भारती जोगी ☆
दुर्गाबाई दामोदर चाफेकर
२२ जून… हा दिवस म्हणजे स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासातील धगधगते पान! त्या पानावरील होमकुंड म्हणजे आपल्या सशस्त्र क्रांतीने पेटविणा-या चाफेकर बंधूंच्या अभिमानास्पद योगदानाचं तेजाळलेलं दर्शन!!
१८९७ मध्ये पसरलेल्या प्लेगच्या साथीमध्ये तपासणीच्या नावाखाली महिलांवर अत्याचार करणाऱ्या प्लेग कमिशनर कॅप्टन रॅंड आणि त्याचा सहकारी आयर्स्ट यांच्यावर गोळ्या झाडून केलेला वध! ही घटना इतिहासातील पानावर कोरली गेली. नंतर १८ एप्रिल १८९८ रोजी मोठे बंधू दामोदर चाफेकर यांना फाशीची शिक्षा झाली. स्वातंत्र्य यज्ञात बलिदान दिलेला हा हुतात्मा!!
पण… त्याच होमकुंडात, समिधा म्हणून सतत स्वतः ला समर्पित करत राहिलेल्या… पण साधा नामोल्लेख च काय पण… साधं नाव देखील माहीत नसलेल्या अशा… उपेक्षित आणि अलक्षित स्त्रियांपैकी एक… स्वातंत्र्यवीराची पत्नी… दामोदर चाफेकरांची अर्धांगिनी *दुर्गाबाई*!!
दुर्गाबाई पिंपरी जवळील *मेंढ-याचे तळे* येथील होळकर घराण्यातील! एक हसरी, मिश्किल स्वभावाची मुलगी! गाणेही उत्तम गात असे. सणासमारंभात जमलेल्या नातेवाईकांना एकत्र करून नाच-गाणी करत असे. थोडक्यात काय तर एक हसता-खळाळता, उत्फुल्ल, निर्मळ निर्झर! अतिशय नाजूक अशी बाला! गंमत म्हणजे तिला शीळ देखील वाजवता येत असे.
ही अशी भरभरून जगणारी दुर्गा, १७ व्या वर्षी दामोदर चाफेकर यांच्याशी विवाह संपन्न होऊन चाफेकरांच्या घरात मोठी सून बनून प्रवेशली आणि दुर्गा… दुर्गा *बाई* बनली… आणि बघता-बघता तिच्यातली अल्लड, खेळकर, खुशमिजाज दुर्गा तिच्या बाईपणाच्या कोशात गुरफटून जणू अस्तित्व हीन झाली. दामोदर रावांच्या अगदी विरुद्ध स्वभावाच्या प्रवाहाविरुद्ध न वाहता, त्याच प्रवाहात स्वतः ला पूर्णपणे सामावून घेत, जीवन प्रवाह वाहता ठेवला तिनं!
दामोदर चाफेकरांना फाशी झाली. दुर्गाबाई आणि धोंडीराम नामे त्यांचा पुत्र मागे राहिले. दामोदर चाफेकरांचे, चाफेकर बंधूंचे नाव स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासात अमर झाले. पण इतिहासात अशा प्राणांची आहुती देऊन अमर झालेल्यांच्या कुटुंबियांचे… पत्नी, मुलांचे काय झाले असेल, हा विचार ही आम्हां आयते स्वातंत्र्य उपभोगणा-यांच्या मनात ही येत नाही, ही खरी शोकांतिका आहे.
रॅंड आणि आयर्स्ट चा खून झाल्यावर ३ महिन्यांच्या आत… दोघांच्याही श्रीमतींना आणि मुलांना स्पेशल, वार्षिक पेन्शन सुरू झाले. ऑन ड्युटी मारले गेले म्हणून खास वाढीव दराने पेन्शन सुरू झाले. पण…
दामोदर चाफेकर… जे… खरं म्हणजे देशासाठी ड्युटी करून फासावर चढले, त्यांच्या पाठीशी घरी राहून ऑन ड्युटी राहूनही, दुर्गाबाई आणि त्यांच्या मुलाला कोणतेही पेन्शन मिळाले नाही. १८९७ मध्ये त्या फक्त १७ वर्षांच्या होत्या. त्यानंतर त्या १९५६ पर्यंत… म्हणजे ६० वर्षे जगल्या. १९४७ मध्ये भारत स्वतंत्र झाल्यानंतर ही त्या ९ वर्षे जगूनही ना त्यांना कोणते पेन्शन मिळाले, ना, पती स्वातंत्र्य सैनिक असल्याचे ताम्रपट मिळाले!
हीच ती खरी खंत! विचार करावा अशी बाब!! शेवटी होमकुंडात किती आणि कोणत्या समिधा जळल्या… कुणी पाहिल्या ना????
☆ मनाचे श्लोक – एक सार्वकालिक ‘मनोपनिषद’… – श्लोक २५ आणि २६ ☆ श्री विश्वास देशपांडे ☆
श्लोक क्र. २५ – –
मना वीट मानू नको बोलण्याचा ।
पुढे मागुता राम जोडेल कैचा? ।
सुखाची घडी लोटता दुःख आहे ।
पुढे सर्व जाईल काही न राहे ।।२५।।
अर्थ : हे मना, माझ्या या बोलण्याचा—एकच गोष्ट पुन्हा पुन्हा सांगण्याचा—तू कंटाळा मानू नकोस. कारण तसे झाले तर ज्या भगवंतप्राप्तीसाठी तू प्रयत्न करीत आहेस, तो राम तुला कसा प्राप्त होईल? या संसारात सुख-दुःखाचे चक्र अखंड सुरू असते. सुखाचा क्षण संपला की दुःख येतेच. आणि शेवटी ज्याला तू सुख मानतोस तेही नाश पावणारेच आहे—काहीही शाश्वत राहात नाही.
विवेचन : या श्लोकात समर्थांची लोककल्याणाची विलक्षण तळमळ पुन्हा एकदा प्रकर्षाने जाणवते. आपण वारंवार सांगत असलेला उपदेश ऐकून लोकांना कंटाळा येऊ शकतो, याची त्यांना जाणीव आहे. म्हणूनच ते प्रेमाने सांगतात—
“माझ्या बोलण्याचा वीट मानू नकोस. ”
आपल्या व्यवहारातही असेच घडते. कोणी आपल्या हितासाठी एखादी गोष्ट सांगितली, उपदेश केला तर तो आपल्याला लगेच पटत नाही. उलट, आपले भले व्हावे या उद्देशाने स्पष्ट बोलणाऱ्या व्यक्तीपासून आपण दूर राहण्याचा प्रयत्न करतो. अशा व्यक्तीबद्दल अनेकदा नकारात्मक मत तयार केले जाते—
“तो खूप स्पष्टवक्ता आहे”, “तो नेहमी नकारात्मकच बोलतो”, “त्याचे ऐकले तर व्यवहार कसा करायचा? ”
परंतु सत्य हे असे आहे की अप्रिय पण हितकारक बोलणारा माणूस दुर्मिळ असतो, आणि त्याचे ऐकणारा त्याहूनही दुर्मिळ!
संसारात सुख आणि दुःख यांचे चक्र अखंड चालू असते. सुखाचा काळ संपला की दुःख येणारच—ही अटळ गोष्ट आहे. एखादा माणूस मोठ्या पदावर पोहोचतो—आमदार, खासदार किंवा मंत्री होतो. पण त्या सत्तेचा उपयोग लोककल्याणासाठी करण्याऐवजी तो स्वतःच्या स्वार्थासाठी करतो. सत्तेची नशा चढते. परंतु एक दिवस सत्ता जाते, आणि त्याला वास्तवाला सामोरे जावे लागते.
एखाद्या उद्योगपतीचा भरभराटीला आलेला व्यवसाय अचानक तोट्यात जातो. जोपर्यंत सुख आपल्या वाट्याला असते, तोपर्यंत आपण त्यातच रमून जातो. त्या सुखात इतके गुंततो की परमेश्वराची आठवणही होत नाही. आपल्याला वाटते—हे सुख कायम राहील.
परंतु हे सर्व प्रारब्धावर अवलंबून असते. जसे सुख आपल्या कर्मानुसार मिळते, तसेच दुःखही भोगावे लागते. सुख-दुःखाचे हे चक्र, जन्म-मरणाचा हा फेरा—कोणालाही टाळता येत नाही.
म्हणूनच, जर आपल्याला या चक्रातून मुक्त व्हायचे असेल, तर परमेश्वराशी नाते जोडणे आवश्यक आहे. आणि त्यासाठी जो कोणी आपल्याला सत्य, श्रेयस्कर आणि हितकारक मार्ग दाखवेल, त्याचे बोलणे कंटाळा न करता ऐकणे गरजेचे आहे.
अर्थात, अशी शिकवण संतच देऊ शकतात. समर्थांसारख्या संतांच्या वचनांमध्ये गूढार्थ, अनुभव आणि करुणा दडलेली असते. त्यांचे प्रत्येक शब्द आपल्याला योग्य दिशेने नेणारे असतात.
खरा साधक कधीच त्यांच्या बोलण्याचा कंटाळा करत नाही; उलट तो त्या मार्गावर निष्ठेने चालत राहतो.
स्वसंवाद ::
माझ्या हितासाठी कोणी सत्य सांगितले तर मी ते खुलेपणाने स्वीकारतो का?
सुखाच्या काळात मी परमेश्वराला विसरतो का, की त्याचे स्मरण ठेवतो?
सुख-दुःख हे क्षणभंगुर आहे याची जाणीव ठेवून मी जीवनाकडे पाहतो का?
संतांचे किंवा हितचिंतकांचे मार्गदर्शन मी मनापासून ऐकतो आणि आचरणात आणतो का?
– – – –
श्लोक क्र. २६ – –
देहे रक्षणाकारणे येत्न केला ।
परी सेवटी काळ घेऊनि गेला ।
करी रे मना भक्ती या राघवाची ।
पुढे अंतरी सोडी चिंता भवाची ।।२६।।
अर्थ: मनुष्य आपल्या देहाचे रक्षण व्हावे म्हणून खूप प्रयत्न करतो, त्याची काळजी घेतो. परंतु शेवटी काळ (मृत्यू) त्याला घेऊन जातोच. म्हणून हे मना, तू राघवाची भक्ती कर आणि मनातील संसाराची (भवाची)चिंता सोडून दे.
विवेचन : मागील श्लोकात समर्थांनी सुख-दुःखाच्या चक्राचे वास्तव आपल्यासमोर ठेवले. या श्लोकात त्याच विचाराला पुढे नेत ते देहाभिमानाचे वास्तव आपल्यासमोर मांडतात.
आपण आयुष्यभर देहाच्या रक्षणासाठी झटत असतो. देहबुद्धी इतकी प्रबळ असते की देहसुखालाच आपण खरे सुख मानतो. शरीराला आनंद मिळावा म्हणून माणूस विविध भोग-विलासात रमतो. काही जण तर केवळ खाणे-पिणे आणि मौजमजा हाच जीवनाचा उद्देश समजतात.
पूर्वी चार्वाकांनीही “यावत् जीवेत् सुखं जीवेत्” असा भोगवाद मांडला होता. आज अनेकजण नकळत त्याच विचारसरणीचा स्वीकार करताना दिसतात.
पण येथे समर्थांचा हेतू देहरक्षणाला नाकारण्याचा नाही. देहाची काळजी घेऊ नये असे ते म्हणत नाहीत. उलट, देह ही एक मौल्यवान देणगी आहे.
“शरीरमाद्यं खलु धर्मसाधनम्”. शरीर हेच धर्मसाधनेचे पहिले साधन आहे.
म्हणून देहाची योग्य काळजी घेणे आवश्यकच आहे. निरोगी आयुष्य जगणे, जीवनाचा आनंद घेणे हेही चुकीचे नाही. परंतु याचबरोबर एक गोष्ट लक्षात ठेवावी लागते की हा देह नश्वर आहे आणि एक दिवस तो सोडून जावेच लागणार आहे.
वेदकाळातील ऋषींनीही आपल्या निरोगी दीर्घायुष्याची कामना केली, पण मिळालेल्या त्या आयुष्याचा उपयोग त्यांनी ईश्वरप्राप्तीसाठी आम्ही करणार आहोत असे स्पष्ट सांगितले.
आपल्या जीवनात आपले काहीतरी ध्येय असते. आस्तिक व्यक्ती परमेश्वर प्राप्तीसाठी झटते तर नास्तिक किंवा बुद्धिवादी मंडळी मानवसेवा, समाजसेवा, वैज्ञानिक प्रगती यासारख्या गोष्टींना आपल्या आयुष्याचे ध्येय मानतात. परंतु बरेचदा आपण मात्र ध्येय बाजूला ठेवून देहासाठीच अधिक वेळ खर्च करतो.
माणूस स्वतःच्या देहाबरोबरच संसाराची, घरदाराची, मुलाबाळांची चिंता करीत राहतो. पण प्रारब्धानुसार जे घडायचे ते घडणारच असते. म्हणून समर्थ सांगतात
– – – “करी रे मना भक्ती या राघवाची”
श्रीरामाबद्दल बोलताना समर्थ नेहमी “या राघवाची” भक्ती करावी असे म्हणतात. त्यांचे आराध्य दैवत असलेला श्रीराम जणू त्यांच्यासमोर उभा आहे. त्या राघवाची असे ते कधीही म्हणत नाहीत. समर्थांसाठी श्रीराम हे केवळ तत्त्व नाही, तर सजीव अनुभव आहे. जणू समोर उभा असलेला ईश्वर!
म्हणूनच ते आपल्याला सांगतात की बाबारे, संसाराची चिंता करण्याऐवजी मनाला राघवाच्या स्मरणात गुंतव. एकदा का मन त्याच्याकडे लागले, की मग संसाराची चिंता आपोआप कमी होत जाते. आणि हळूहळू अशी भावना दृढ होते की राम कर्ता आहे, सर्व काही त्याच्याच कृपेने घडते आहे.
अशी श्रद्धा निर्माण झाली की मन हलके होते, चिंता निवळते आणि जीवन अधिक शांत, समाधानी बनते.
स्वसंवाद ::
मी माझ्या देहाची काळजी घेताना त्यालाच अंतिम सत्य मानून चालतो का?
जीवनाचे खरे ध्येय लक्षात ठेवून मी देहाचा उपयोग करतो आहे का?
संसाराच्या चिंतेत मी इतका गुंततो का की परमेश्वराचे स्मरण विसरतो?
माझ्या मनाला राघवाच्या नामस्मरणाची सवय लागली आहे का?
काही लोक असे आहेत, जे सकाळी मोबाईल हातात घेतल्यावर आपल्या गृप्समध्ये पहिला मेसेज Good morning चा टाकतात. बरोबर एखाद गुलाबाचे फूल पण पोस्ट करतात. खरतर हा एक अभिवादन करायचा प्रकार आहे.
मी कधी कोणाला Good morning चा मेसेज पाठवत नाही. गुलदस्ता पाठवत नाही. आणि कोणी मेसेज पाठवला तर मी उत्तरही देत नाही. मला हे उगीचच, waste of time, काय गरज आहे या सगळ्याची? अस वाटत. बहुतेक यात माझा उद्धटपणा दिसतो.
काहीच रिसपोन्स मिळत नसल्यामुळेच, पूढे असे मेसेज मला येत नाहीत. कदाचित फारच शिष्ठ आहेत या असा शिक्का पण माझ्या नावावर मारला जात असावा.
वर्तमानपत्रात एक लेख वाचल्यावर या Good Morning msg कडे बघायचा माझा दृष्टिकोन बदलला. आता हा असा मेसेज किती महत्वाचा असू शकतो. हे लक्षात आल. दृष्टिकोन बदलला की विचार बदलतात. हे खरय.
आता एका वेगळ्या अर्थाने Good morning msg पटला.
Are you dead? हा लेख वाचला.
चीनमध्ये हा app वापरणारे बरेच लोक आहेत. आजकाल फॅमिलीच्या नावाखाली जास्तीत जास्त 3 जणांची संख्या असते. त्यातील मुलगा/ मुलगी शिक्षणासाठी, लग्न झाल्यावर दूर गेले की फॅमिलीत फक्त 2 जण उरतात. जसजस वय वाढत तस ज्येष्ठांच्या समस्यांना तोंड देत, एक वेळ अशीही येते की दोघांपैकी फॅमिलीत एकच उरतो.
आधीच्या काळात एका मुलाला वाढवायला आजूबाजूचे अनेक लोक असायचे. घरातच कमित कमि आठ दहा जण असायचे. आता तर हम दो हमारे दो हा हिशोब पण गेलाय, आता एकच.. किंवा मुल नकोच. आता DINK चा जमाना आहे (double income no kids), मग एकटे राहणार्यांचा नंबर वाढणारच. त्यात 996 कल्चर.
9 to9 job, मग इतक काम केल्यावर दोन दिवस आराम, भटकंतीत. 6 days busy. त्यामुळे आजूबाजूला राहणार्या लोकांशी संबंध नाही, भेटीगाठी नाही, बोलण नाही. शेजारी कोण. राहतय? हे सुद्धा खूपदा माहित नसत. social life as such नाहीच.
अशा वेळेस त्यांच्या घरात काय घडलय/ काय घडतय? हे कळायला मार्ग नाही. त्यात privacy च्या नावाने वागण्या बोलण्यात मोकळीक नाही. विदेशी राहणार्या मुलांची संख्या दिवसेंदिवस वाढतेय, तेही एक मोठ कारण आहेच.
आज single/ एकटे राहणार्यांची संख्या वाढतेय. त्याला कारण अनेक आहेत.
नोकरीमुळे दुसर्या शहरात जाणे, डायव्होर्स झाल्यावर, लग्न करायचे नाही, अशा विचारांचे पण बरेच आहेत. ऑफिस मधून घरी आल्यावर ही conference calls. Work culture अस झालय की आई-वडीलां बरोबरही बोलायला वेळ मिळत नाही. त्यामुळे
एकटेपणा ही समस्या फक्त जेष्ठांचीच आहे अस राहिलेल नाहिये.
एका समृद्ध घरात एकटी राहणार्या वृद्ध स्री चे प्राण गेले, हे कळल केंव्हा? तर आठवड्याभरानंतर. या दरम्यान कधी कोणी फोन केला, रिंग गेली, फोन उचलला नाही… अस कदाचित झाल असेल. तर बाहेर गेल्या असतील अशी आपली समजूत करून, या बाबतीत कदाचित लक्ष दिल गेल नसेल.. काय नक्की झाल असाव? माहित नाही. पण कळल मात्र आठ दिवसांनी. हे बरोबर आहे का?
Are you dead?
या app ला CHINA मध्ये छान response मिळाला/ मिळतोय.
एकटे राहणार्यांनी फक्त रोज तेथे एक बटन दाबायचे असते. आणि
मी आहे
I am there , I am in
ही सूचना द्यायची. जर लगातार दोन दिवस हे बटन operate झाल नाही, तर काही problem असावा.
अस लक्षात येईल. त्या app वर registration करताना, काही महत्वाचे, तुमच्या नातेवाईकांचे फोन. नंबर नक्की घेतले असतीलच. त्यानुसार पूढचे काम करण सोप होईल.
मधून मधून वर्तमान पत्रात, TV वर या संदर्भात काही भयानक बातम्या ऐकायला वाचायला मिळतात.
भारतात या app ची गरज आहे का?
आज भारतात 5% लोक एकटे राहतात.
ही संख्या वाढतच चाललीय.
आज तरी या प्रकारचा App भारतात नाही.
याप्रश्नावर काहीउपाय आहे का?
मला वाटत
जर आपला एक गृप असला, मग तो मित्र/मैत्रीणींचा, आपल्या आजूबाजूला राहणार्या लोकांचा, ऑफिस मधला, समवयस्क मैत्रीणींचा, कोणताही असू शकतो.
त्या गृपवर फक्त
Good Morning msg रोज टाकायचाच असा नियम ठरवला तरी हा प्रश्न सुटू शकतो. नाही का?
आज खासकरून जेष्ठांसाठी अनेक संस्था काम करतायेत.
UP मध्ये 112 वर फोन केला तर लगेच मदद मिळते. तर केरळमध्ये एकटेपणा घालवायला Listener parlours.. Manglore मध्ये sathi Shifts आहेत.
एकटे राहणाऱ्यांच्या मनात… मला काही झाल तर लोकांना कळेल का? केंव्हा कळेल? हा प्रश्न भेडसावतोच.
काळजी कमी करण्याच एक रहस्य समजून घ्याव. उगीच कल्पनेत काळजी करत बसण्यापेक्षा काही तरी निर्णय घ्यावा. व्यक्त व्हाव.
जस शरीरात वेदना झाल्या की आपण डोॅक्टरकडे जातो, तसेच मनात काळजी / शंका / भीती असेल तर ती वेळेवर समजून व्यक्त होण आवश्यक आहे.
वेळेवर घेतलेल्या correct decision मुळे तुमचा आत्मविश्वास वाढतो.
No need to worries.
म्हणून रोज good morning चा मेसेज गृपमध्ये पाठवणे हा सरळ साधा सोपा उपाय चांगला आहे. सहज करण्यासारखाही आहे.
आयुष्यातील चुका जरी खोडता येत नसल्या तरी दुरुस्त नक्कीच करता येतात.
मी माझी चूक सुधारणार…
आजपासून मी good morning लिहिणार आणि अशा मेसेजला उत्तरही नक्की देणार.
☆ मनाचे श्लोक – एक सार्वकालिक ‘मनोपनिषद’… – श्लोक २३ आणि २४ ☆ श्री विश्वास देशपांडे ☆
श्लोक क्र. २३ – – –
न बोले मना राघवेवीण काही ।
जनी वाऊगे बोलता सुख नाही ।
घडीने घडी काळ आयुष्य नेतो ।
देहांती तुला कोण सोडू पाहतो ।।२३।।
अर्थ : हे मना, एका राघवाशिवाय म्हणजेच भगवंताच्या नामाशिवाय दुसरे काही बोलू नकोस. तू इतर व्यर्थ बडबड केलीस तर तुला जे पारमार्थिक सुख अपेक्षित आहे ते मिळणार नाही. काळ क्षणाक्षणाला आपले आयुष्य कमी करीत असतो. जर या काळात परमेश्वराचे नामस्मरण करणे राहून गेले, तर अंतकाळी तुला कोणीही वाचवू शकणार नाही.
विवेचन : मागील श्लोकात समर्थांनी आपल्या हितासाठी श्रीरामाचे नाव चित्तामध्ये दृढ धारण करावे असा उपदेश केला. या श्लोकात त्याच विचाराचा विस्तार करत ते आपल्या मनाला बजावतात की हे मना, एका रामाशिवाय तू दुसरे काही बोलू नकोस. कारण इतर गोष्टी बोलण्यात खरे सुख नाही. काळ कोणासाठीही थांबत नाही. तो कोणाचाही अपवाद करत नाही. क्षणाक्षणाला तो आपले आयुष्य कमी करीत असतो आणि एक दिवस असा येतो की अंतिम क्षणी तो आपल्यालाही सोडत नाही.
समर्थांना आपल्या कल्याणाची किती तळमळ आहे हे या श्लोकातून जाणवते. आपले जीवन म्हणजे परमेश्वराकडून मिळालेली एक अमूल्य भेट आहे. पण या जीवनामध्ये ज्याने आपल्याला ही सुंदर देणगी दिली त्या परमेश्वरालाच आपण विसरतो आणि निरर्थक बोलण्यात आपले आयुष्य वाया घालवतो.
बोलण्यात आपली मोठी शक्ती खर्च होत असते. अनेकदा बोलण्यामुळे जेवढा शीण येतो, तेवढा एखादे श्रमाचे काम केल्यामुळेही येत नाही. एखादा वक्ता जर दोन-तीन तास सतत बोलत राहिला तर त्याला किती थकवा येतो हे त्यालाच ठाऊक असते. शाळा-महाविद्यालयांमध्ये शिकवणाऱ्या शिक्षकांना आणि प्राध्यापकांनाही हा अनुभव वारंवार येत असतो.
परंतु समाजात आपण पाहतो की बरीच मंडळी व्यर्थ बोलण्यात वेळ घालवतात. चौकात उभे राहून गप्पा मारणारी तरुणांची टोळकी, कट्ट्यावर बसणारे लोक, कार्यक्रमांच्या निमित्ताने एकत्र जमलेली मंडळी या सगळ्यांच्या चर्चांना कोणताही विषय चालतो. एकदा बोलायला सुरुवात झाली की कोणत्याही विषयावर अखंड बोलत राहणे ही सवय बनते. यात वेळेचा आणि शक्तीचाही अपव्यय होतो.
अति बोलण्याची सवय वृद्धापकाळात त्रासदायक ठरू शकते. अशा वेळी घरातील लोकांनाही ती माणसे नकोशी वाटू लागतात. बोलायला कोणी नसते आणि त्यामुळे मनात निरर्थक दुःख साचत जाते. म्हणून वेळीच सावध होणे आवश्यक आहे. आजच्या काळात टीव्हीवरील चर्चा, भडक बातम्या किंवा निरर्थक वादविवाद यांकडे लक्ष देण्यातही आपला बराच वेळ खर्च होतो. परंतु साधकाच्या दृष्टीने त्यातून फारसे काही निष्पन्न होत नाही.
आपले खरे हीत साधायचे असेल तर भगवंताच्या नामाशिवाय दुसरा मार्ग नाही. त्या नामाला विसरून आपण कितीही इतर गोष्टी बोलत राहिलो, तरी ती व्यर्थ बडबडच ठरते. त्यामुळे खरे सुख मिळत नाही. येथे सुख म्हणजे परमेश्वर प्राप्तीच्या किंवा आत्मसाक्षात्काराच्या दृष्टीने होणारी आपली वाटचाल असे म्हणता येईल.
नाम घेण्याची सवय जर आयुष्यभर अंगवळणी पडली नाही, तर अंतकाळी ते सहजपणे आपल्या मुखात येणार नाही. संतांना माणसाचे कल्याण व्हावे याची प्रचंड तळमळ असते. म्हणूनच संत गोंदवलेकर महाराज देखील आपल्या प्रवचनांमध्ये वारंवार सांगतात की तुम्ही रामनाम घ्या.
समर्थ रामदासांचाही कळकळीचा हाच संदेश आहे. जीवनाचा एकही क्षण व्यर्थ घालवू नका; भगवंताचे नामस्मरण करा.
स्वसंवाद ::
वेळ, शक्ती आणि आयुष्य वाया घालवणाऱ्या व्यर्थ चर्चांपासून मी स्वतःला दूर ठेवू शकतो का?
माझ्या दैनंदिन जीवनात भगवंताचे नामस्मरण कितपत आहे?
आयुष्याचा प्रत्येक क्षण अमूल्य आहे याची जाणीव ठेवून मी तो अधिक अर्थपूर्ण बनवण्याचा प्रयत्न करतो का?
– – – –
श्लोक क्र. २४ – –
रघूनायकावीण वाया शिणावे ।
जनासारिखे व्यर्थ का वोसणावे ॥
सदा सर्वदा नाम वाचे वसो दे ।
अहंता मनी पापिणी ते नसो दे |२४|
अर्थ:हे मना, एका रामाला सोडून केलेली सगळी कामे व्यर्थ आहेत. भगवंताला विन्मुख झालेल्या सामान्य माणसांप्रमाणे व्यर्थ बडबड (वोसणावे) करू नये. त्या बाष्कळ बडबडी ऐवजी भगवंताचे नाव मुखात असू दे. अहंकार हा अध्यात्मामध्ये फार मोठा शत्रू आहे. त्याला मनात थारा देऊ नकोस.
विवेचन: समर्थांना मानव जातीच्या कल्याणासाठी वाटणारी तळमळ ही एखाद्या मातेसारखी आहे. आपल्या मुलाचे कल्याण व्हावे म्हणून ती त्याला जरी आवडत नसले तरी एखादी गोष्ट पुन्हा पुन्हा सांगत असते. त्याचप्रमाणे समर्थ मागील श्लोकातीलच गोष्ट या ठिकाणी पुढे विस्तारून सांगतात. आधीच्या श्लोकात मनाला राघवाशिवाय काही बोलू नकोस कारण व्यर्थ बोलण्यामध्ये सुख नाही असे त्यांनी सांगितले आहे. या श्लोकात हीच गोष्ट ते वेगळ्या शब्दात आपल्याला सांगतात.
भगवंताच्या नामामध्ये अपार सामर्थ्य आहे. शिणलेल्या मनाला शक्ती देण्याचे, उभारी देण्याचे सामर्थ्य त्यात आहे. आपण जर खऱ्या सुखाचा शोध घेत असू तर भगवंताच्या नामाइतके सुख कशातच नाही. अन्य सुखे तात्पुरती आहेत आणि अंतिमतः दुःख देणारीच आहेत हेच समर्थ या श्लोकातून आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करतात. म्हणून आपल्या जिभेवर नेहमी भगवंताचे नाम असावे असे त्यांचे सांगणे आहे.
शब्द किंवा भाषा बोलणे हे माणसाचे वैशिष्ट्य आहे. भाषेच्या माध्यमातून आपण आपले विचार व्यक्त करतो. शब्दांमध्ये किंवा भाषेमध्ये केवढी शक्ती असते हे जेव्हा आपण अधिकारी व्यक्तींच्या साहित्याचे वाचन करतो किंवा त्यांचे बोल ऐकतो तेव्हा लक्षात येते. बोलण्याला वाचाशक्ती असेही आपण म्हणतो. हे सरस्वतीचे वरदान आहे. पण सर्वसामान्य लोक बऱ्याच वेळा वायफळ बोलण्यात ही शक्ती व्यर्थ घालवत असतात.
पण ज्यांना साधना मार्गावर वाटचाल करायची आहे, भगवंत जोडायचा आहे, त्यांना अशी बाष्कळ बडबड करून चालणार नाही. आपल्या वाचेने त्यांनी भगवंताचे नाम घ्यायला हवे तशी सवय करायला हवी. उठत बसता, कार्य करता, सदा घेता देता… भगवंताचे नाम मुखात यायला हवे. मी जर साधक आहे आणि भगवंत प्राप्ती हे माझे ध्येय आहे असे जर आपण मनाशी ठरविले असेल तर जनांमध्ये मिसळताना सामान्य माणसांसारखी बडबड करून मला भागणार नाही. तसे केले तर मी माझ्या वाचेची शक्ती व्यर्थ घालवली असा त्याचा अर्थ होईल.
सुरुवातीला लोक मला नावे ठेवतील. माझी चेष्टा किंवा टिंगलटवाळी करतील पण मला भगवंत प्राप्तीसाठी ती सुद्धा सोसता आली पाहिजे. काही दिवसांनी लोकांना हे लक्षात येईल की ही व्यक्ती आपल्यासारखी नाही. ती साधक आहे. मग ते तुमच्याशी आदराने व्यवहार करतील. समर्थ या सगळ्या परिस्थितीतून गेले आहेत. ही परिस्थिती त्यांनी अनुभवली आहे आणि त्यातूनच त्यांचे हे अनुभवाचे बोल आले आहेत.
समाजात मिसळताना आपल्याला लोकांनी नावे ठेवू नये किंवा आपण कुठे कमी पडू नये म्हणून आपण त्यांच्यासारखे वागण्याचा प्रयत्न करतो. बरेचदा आपण जसे नसतो तसे दाखवण्याचा प्रयत्न करतो. मी विद्वान आहे, ज्ञानी आहे मला फार कळते अशा प्रकारचे मुखवटे धारण करतो. हा मुखवटा लोकांना दाखवण्यासाठी जरी असला तरी त्यातूनच अहंकार जन्म पावतो. अहंकार हे पापाचे मूळ आहे. रावणाला स्वतःच्या शक्तीचा, सामर्थ्याचा केवढा अहंकार झाला होता! जगामध्ये माझ्यासारखा कोणी नाही, मला कोणी हरवू शकत नाही हा त्याचा अहंकार त्याचे विनाशाला कारणीभूत ठरला. अहंकारातून अनेक नको असलेल्या गोष्टी घडतात. म्हणून समर्थ अहंतेला पापिणी असे म्हणतात.
म्हणून, हे मना, वाणीमध्ये भगवंताचे नाम ठेव आणि मनातून अहंकार दूर ठेव. यातच तुझे खरे कल्याण आहे.
स्वसंवाद ::
माझ्या बोलण्यात भगवंताचे नाम कितपत आहे आणि व्यर्थ बडबड किती आहे?
भगवंताचे नाम घेण्याची सवय मी स्वतःला लावतो आहे का?
माझ्या मनात अहंकाराची छटा आहे का? ती ओळखून मी कमी करण्याचा प्रयत्न करतो आहे का?
केवळ हिंदीच नव्हे तर भारतातील विविध भाषेत गाणी गाऊन अवघ्या भारतीयाच्या मनावर राज्य करणारे दोन गायक म्हणजे किशोर कुमार आणि आशा भोसले! स्वतःच्या हिमतीवर त्यांनी स्वतःचे साम्राज्य उभे केले.
मात्र सुरुवातीच्या काळात त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. अगदी वाईट अपमान सहन करावे लागले.
त्यातला एक जीवघेणा प्रसंग आज सांगतो.
*
झालं असं की, एका सिनेमाच्या गाण्याचे रेकॉर्डिंग होते त्यासाठी किशोरदा आणि आशा ताईंना बोलावलेलं होतं. गाण्याच्या साउंड रेकॉर्डिगसाठी त्याकाळातले अत्यंत फेमस आणि टॉपचे समजले जाणारे रॉबिन चॅटर्जी होते. आणि हा तो काळ होता जेव्हा किशोरदा आणि आशाताई स्ट्रगल करत होत्या.
त्यात समोर रॉबिन याना पाहून हे दोघेही थोड्या दडपणाखाली आले.
मात्र हिंमत करून दोघांनी माईकसमोर येऊन गायला सुरु केलं.
मुखड्याच्या दोन ओळी गाऊन होत आहेत नाहीत तोवर रॉबिनजी यांनी “स्टॉप” स्टॉप म्हणत रेकॉर्डिंग थांबवलं.
आणि सिनेमाच्या दिग्दर्शक / निर्मात्यांना म्हणाले,
“ये कौन लोग लेके आये गाने के लिये? इन्हे तो कुछ भी नही आता… आवाज अच्छी नही है… गाने की आवाज है कहा इनकी? जाओ जाकर गीता को बुलाओ”
*
वरच्या पट्टीतले त्यांचे हे बोलणे ऐकून सगळेच सुन्न झाले. आशाताई अन किशोरदावर काय आभाळ कोसळले असेल… कल्पना करवत नाही.
*
शांतपणे ते दोघे तिथून बाहेर पडले. डोळ्यात गच्च गहिवर आणि हृदयात मात्र अपमानच आगडोंब उसळलेला!
तिथून जवळच महालक्ष्मी स्टेशन होते. तिथं जाऊन रिकाम्या बाकड्यावर ते दोघे बसले.
दोघेही सुन्न… थोड्या वेळाने किशोरदा म्हणाले, “भूक लगी है, कुछ देखता हू”
आणि असं म्हणून ते भल्या मध्यरात्री त्या स्टेशनवर असलेल्या एका स्टॉल वर गेले तिथं बटाटेवडे होते तेही शिळे… तेच घेऊन किशोरदा आले. आणि या दोघांनी शांतपणे ते वडे खाताना किशोरदा म्हणाले, “आशा… हमको निकाल दिया”
त्यावर नेहमीच पॉजिटीव्ह विचार करणाऱ्या आशाताई म्हणाल्या, “नही… दादा… आप की जो आवाज है उसे कोई रोक नही सकता, “
आणि मग शिळा वडा खाऊन… पाणी पिऊन दोघांनी घरची वाट धरली.
*
यानंतर चार वर्षानंतर या दोघांचे अनेक सिनेमे (गाणी) हिट झाली. दोघांचेही नाव झाले. किशोरदा तर गायक प्लस हिरो असे डबल फेमस झाले.
आणि एका सिनेमाच्या गाण्यासाठी पुन्हा हीच जोडी “त्याच” स्टुडिओत एकत्र आली आणि योगायोग पहा… त्याचेही साउंड रेकॉर्डिस्ट तेच रॉबिनदा होते ज्यांनी याना रिजेक्ट केलं होत.
त्यांना तिथे पाहताच किशोरदा आशाताईंना म्हणाले “आशा… वो देखो व्हिलन बैठा है… वो अगर इधर रेकॉर्डिस्ट है तो मै गाना नही गाऊंगा… “
त्यावर आशाताई दादाला म्हणाल्या, “दादा, ऐसे नही करते… आज हमारा नाम है तो क्या हुआ? किसी के पेट पे पैर नही देते.
किशोरदा म्हणाले, तुम्हे याद है… उसने हमारे साथ क्या किया था?
*आशाताई म्हणाल्या, “याद है… लेकिन अपना वख्त खराब था… आज अपना है तो गुरुर किस बात का? “*
*
आणि अशा रीतीने ते गाणे रेकॉर्ड झाले.
गोष्ट इथं संपलीय!
डॉ. डीडी क्लास : एखादा माणूस मोठा का होतो? तर जमलं तर त्याच्या तळपायाकडे पहा… किती भेगाळले असतात अशा लोकांचे पाय… अपमान, उपासमार, अवहेलना… हे सगळे काटे पायात रुतलेले असतात आणि तरी हि मंडळी शांतपणे ते काटे बाजूला ठेवून पुढे चालत असतात. त्या काट्याला भांडत बसत नाहीत की त्याची जिरवण्यासाठी काही करत नाहीत. ते काम नियतीवर सोडावे आपण असं मला वाटत. कारण कर्मा काय अन नियती काय… ज्याचे त्याचे हिशोब चुकते करत असते त्यासाठी आपण आपला वेळ का घालवावा? आपण आपल्या कामात राहून आपल्या कामातूनच जगाला उत्तर द्यावे… हेच जास्त बेस्ट! तसे तुम्हालाही जमावे… (कारण आपल्यापैकी प्रत्येकाच्या आयुष्यात असे “रॉबिन चॅटर्जी” आलेले असतात.) त्यांना वळसा मारून पुढं जावं! येणारा काळ त्यांना बरोबर उत्तर देतो… रिलॅक्स मंडळी!
☆ ।। श्री नारद उवाच ।। – नारद भक्ति सूत्रे — सूत्र ६४ आणि ६५ ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले☆
।। श्री नारद उवाच ।।
भक्ति सूत्र –६४
अभिमानदम्भादिकं त्याज्यम् ||६४||
अर्थ : अभिमान म्हणजे गर्व, ढोंग, कपट, यांसारख्या दुर्गुणांचा त्याग करावा.
विवेचन: अभिमान हा भल्याभल्या साधकांना पथभ्रष्ट करतो असे म्हटले तर चुकीचे होणार नाही. याची अनेक उदाहरणे आपल्या सर्वांना ठाऊक आहेत. अभिमान आणि स्वाभिमान हे जोडशब्द आहेत. त्यातील सीमारेषा अत्यंत सूक्ष्म आहे. ती नीट समजून घेतली तर मनुष्यात आमूलाग्र बदल घडेल. अभिमान कोणाला नसतो ? , जसा तो श्रीमंताला असतो तसा तो भिकाऱ्याला देखील असतो. समजा एखाद्या भिकाऱ्याला एका घरात भीक मिळाली नाही तर तो लगेच सांगतो, तुमचं शेवटचं घर नाहीए, मी इतरत्रही भीक मागेन. असा अभिमान काय कामाचा ? हिरण्यकश्यपूला मारायला भगवंत नरसिंह अवतारात प्रगट झाले. साक्षात भगवंत समोर असतानाही हिरण्यकश्यपूचे हात नमस्कारासाठी जोडले न जाता ते देवाला मारण्यासाठी शस्त्राकडे गेले. यावरून आपल्याला अभिमान काय ‘चीज’ आहे हे लक्षात येऊ शकते. आपल्या घरात दुधाचे पातेले असते, त्याला आतील बाजूने दुधातील तुपाचा तवंग चिकटलेला असतो. घरातील माताभगिनी त्यात गरम पाणी ओतून ठेवतात म्हणजे तूप पाण्यात विरघळून जाते आणि नंतर ते पातेले घासून स्वच्छ करण्यात येते. इतके करूनही जर ते पातेले नीट घासले गेले नाही आणि त्यात पुन्हा दूध घेतले गेले तर तेही नासतें. मानवी मनाचे असेच आहे. अभिमान मनुष्याच्या मनाला असाच चिकटून असतो. सर्व सद्गुरू मातृहृदयी असतात. ते आपल्या मनाचे पातेले लख्ख व्हावे, आपली देहबुद्धी, आपला अभिमान नष्ट व्हावा म्हणून प्रयत्न करीत असतात. मनुष्याने ह्या नश्वर जगात अलिप्त व्हावे असे त्यांना वाटत असते म्हणून ते अभिमानाचा समूळ नाश करण्याचा प्रेमळ सल्ला साधकाला देतात.
मनुष्याची वाटचाल तीन प्रकारे होत असते. देहाकडून देहाकडे, देहाकडून मनुष्यत्त्वाकडे आणि देहाकडून देवत्वाकडे. यापैकी पहिली वाटचाल आपसूक होत असते. दुसरीसाठी काही प्रयत्न करावे लागतात तर तिसरी स्थिती प्राप्त होण्यासाठी मात्र अनेक आणि अथक प्रयत्नांची गरज असते. श्री सद्गुरू गोंदवलेकर महाराज यांचे एक वचन आहे, *”मनुष्य म्हणून जन्माला आलेला माणूस, माणूस म्हणून मेला तरी बरा! “* साधक, मुमुक्षु, सिद्ध या तर खूप पुढच्या गोष्टी राहिल्या. श्री महाराज असे का म्हणाले असतील ? यावर चिंतन करताना असे लक्षात आले की दैनंदिन व्यवहार करताना मी दिवसभरात मनुष्य असल्याचे दाखवून देतो, थोडक्यात मी दिवसभर माणसा सारखा वागतो का ? थोडा सूक्ष्म विचार केला तर असे लक्षात येईल, मनुष्य अनेक प्राण्यांसारखा वागत असतो. उदा. स्वार्थासाठी तो मांजरीसारखा लोचट होतो, कुत्र्यासारखा तो लोकांवर भुंकत असतो (डाफरतो! ), कधी तो गरीब गाय, वासरू असतो तर कधी गोगलगाय, तर कधीकधी तो गाढवासारखा सुखदुःखांची ओझी वाहत असतो. थोडक्यात दिवसभरात मनुष्य आपल्या कृतीतून स्वतःमधील ‘अनेक’ प्राण्यांची ओळख स्वतःच स्वत:ला आणि जगाला करून देत असतो. दिवसभरात तो फार कमी वेळ ‘मनुष्य’ म्हणून वागत असतो. श्रीदासबोधातील ‘पढतमूर्ख समास’ सुद्धा अशा लोकांसाठीच लिहिला गेला असावा, असे म्हणायला हा उत्तम आधार आहे. श्रीसमर्थ आपल्याला सांगत आहेत की ‘मनुष्य ते मनुष्य’ प्रवास होण्यासाठी मनुष्याच्या अंगी अतिलीनता असणे अनिवार्य आहे. अतिलीन होणे म्हणजे ‘मी’ चा पूर्णपणे ऱ्हास होणे. आंब्याचे झाड फळांनी डवरले की नकळत झुकते तशी महान मंडळी कायम अतिलीन असतात. स्वतः ‘सद्गुरू’ असूनही श्री गोंदवलेकर महाराज स्वतःला रामाचा ‘दीनदास’ म्हणायचे. समर्थ तर स्वतःला रामदास म्हणायचे. विश्वमाऊली झालेले श्री ज्ञानेश्वर महाराज स्वतःला *”येऱ्हवी तरी मी मुर्खु”* (ज्ञाने. १. ७६) असे संबोधतात.
शरणागती खूप महत्वाची आणि अत्यावश्यक आहे. कार्यालयात अधिकाऱ्यांपुढे स्वार्थासाठी लीन (खरेतर हाजीहाजी करणे) आणि भगवंता पुढे लीन होणे यात मूलभूत फरक आहे, तो वाचकांनी नीट समजून घ्यावा. संत जरी असे अतीलीन होऊन वागत असले, सामान्य मनुष्य मात्र तसा नसतो. त्याला जात्याच अहंकार असतो आणि वाढत्या वयागणिक आणि इतर गोष्टींमुळे तो कमी न होता, त्यात सतत वाढ होत असते. म्हणून अहंकार ते लीनता हा प्रवास कठीणच असतो. हा प्रवास करणे म्हणजे मनाला बांध घालणे, मनावर नियंत्रण मिळविणे. मनुष्याकडे व्युत्पत्ती, विद्वता जरूर असावी, पण ती विसरता आली पाहिजे, नव्हे विसरता आलीच पाहिजे. मी म्हणजे कोणी विशेष आहे असे न वाटता आपण जगातील सर्व वस्तुमात्रांसारखेच एक आहोत असे वाटून खऱ्या अर्थाने नम्र होता आले पाहिजे. सद्गुरुंना शरण गेल्याने अंगी लीनता येऊ शकते. साधना करताना आपली सर्व कर्मे जर भगवंतांस किंवा आपल्या सद्गुरूंना अर्पण करता आली तर अंगी लीनता बाणायला अधिक गती येते. समर्थ म्हणतात त्याप्रमाणे लिनतेकडील प्रवास साधकाला जमू लागला याचा अर्थ साधकाची प्रगती योग्य गतीने चालू आहे. समर्थांना अपेक्षित असलेली लीनता ही दिखाऊ, नाटकी नक्कीच नसावी. ती सर्वभावें आणि स्वभावतः असावी. सर्वभावें (कोणत्याही भावात) म्हणजे मनापासून स्वीकारलेली लीनता आणि स्वभावे म्हणणे सहजभावाने कोणताही अभिनिवेश न बाळगता. समर्थ काही दुर्गुणांच्या अति नको असे म्हणतात पण लीनतेच्या बाबतीत मात्र अति हवे असे आग्रहाने सांगतात. लीनतेचे वागणे सर्वांना आवडते.
आज ‘चार’ पुस्तके शिकलेला मनुष्य स्वतःला ‘शहाणा’ समजू लागतो आणि स्वतःच्या (काही कारणांमुळे) कमी शिकलेल्या आईबाबांना अडाणी’ समजतो. इतकेच नव्हे तर हाच मनुष्य स्वार्थासाठी अनेक ठिकाणी लाचारी करताना दिसत असतो. म्हणून समर्थ सांगतात की अतिलीनता ही दिखाऊ असू नये तर ती पोटातून असावी, फक्त ओठातून असू नये. कारण दिखाऊपण फार काळ टिकत नाही. एक वचन आहे, *’आपण सर्वांना सर्वकाळी मूर्ख बनवू शकत नाही’*, काही जणांना काही वेळा मूर्ख बनवू शकतो. एकदा का दिखाऊपणाचा मुखवटा उतरला की मग त्या मनुष्याचे आयुष्य विराण बनते. साधन करता करता मनुष्य आपले सर्व कर्म परमेश्वराच्या चरणी अर्पण करतो, तेव्हा लीनता त्याच्या अंगी मुरू लागते. मनुष्याच्या अंगी खरी लीनता असेल तर ती संत-सज्जनांना आनंद देते.
या सूत्राचे सार एक ओळीत सांगायचे झाल्यास पुढील प्रमाणे सांगता येईल.
जनीं निंद्य ते सर्व सोडोनि द्यावे।
(मनाचे श्लोक 2)
जय जय रघुवीर समर्थ
=============
भक्ति सूत्र –६५
“तदर्पिताखिलाचार: सन् कामक्रोधाभिमानादिकं तस्मिन्नेव करणियम् ||६५||”
अर्थ: आपले सर्व आचार, व्यवहार भगवंताला अर्पण करूनही काम, क्रोध, अभिमान इत्यादि विकार उद्भवले तर तेही भगवतांच्या ठिकाणी समर्पित करावे.
विवेचन: आपण सध्या नारद भक्ति सूत्रे अभ्यासत आहोत. पारमार्थिक मार्गाने जाताना चूक झाली तर पुन्हा पहिल्यापासून सुरुवात करावी लागते. तिथे काठावर उत्तीर्ण, गुणाची जोड देऊन उत्तीर्ण, अमक्याचा मुलगा, तमक्याचा मुलगा असे तिथे चालत नाही. हजारो वर्षे तपश्चर्या करणारे ऋषी छोट्याश्या कामनेचे बळी ठरून साधनाभ्रष्ट झाल्याची उदाहरणे इतिहासात आढळतात. हे सर्व सांगण्याचे कारण असे की जप करायला सुरुवात केली, नाम घ्यायला सुरुवात केली, एखाद्या सत्संगात अमुक एक साधना ऐकली आणि ती करण्यास सुरुवात केली की मनुष्याला आज आता ताबडतोप अनुभूती हवी असते. अहो, जिथे पदवीधर होण्यासाठी आयुष्याची पंधरा वर्षे खर्च करावी लागतात, तिथे भगवतांची प्राप्ती साधना करून होईल असे म्हणणे किती सयुक्तिक आहे याचा प्रत्येक साधकाने विचार करायला हवा.
मनुष्याची वाटचाल सामान्यपणे तीन प्रकारे होत असते. देहाकडून देहाकडे, देहाकडून मनुष्यत्त्वाकडे आणि देहाकडून देवत्वाकडे. यापैकी पहिली वाटचाल आपसूक होत असते. दुसरीसाठी काही प्रयत्न करावे लागतात तर तिसरी स्थिती प्राप्त होण्यासाठी मात्र अनेक आणि अथक प्रयत्नांची गरज असते. श्री सद्गुरू गोंदवलेकर महाराज यांचे एक वचन आहे, “मनुष्य म्हणून जन्माला आलेला मनुष्य मनुष्य म्हणून मेला तरी बरा! “
मनुष्याला मनुष्य म्हणून घडण्याच्या मागे अनेक विकार विघ्न आणीत असतात. विकारांचा विचार आपण विस्तृतपणे मागील लेखांत पाहिला आहे. या विकारांवर विजय मिळवणे निव्वळ अवघड आहे. एकतर सध्या विकारांची संख्या हनुमानाच्या शेपटीसारखी वाढत आहे आणि मनुष्याची निश्चयशक्ती मात्र कमकुवत होत आहे, त्यामुळे मनुष्याला खूप कष्ट करण्याची गरज आहे.
यावर एक उपाय नारद महाशय सांगतात, की हे सर्व विकार भगवंताच्या चरणी अर्पण करावेत. त्यासाठी सर्वात सोपा उपाय म्हणजे प्रत्येक गोष्ट भगवंताला सांगून करावी. प्रत्येक इच्छा देवाला सांगावी, प्राप्ती झाली तर त्याचा प्रसाद म्हणून स्वीकारावी आणि प्राप्ती झाली नाही तर त्याची इच्छा नाही असे म्हणून ती इच्छा आपल्या मनातून काढून टाकावी. थोडक्यात आपले विकार देवाला अर्पण करावेत. अशी स्थिती अनेक साधकांना अनुभवावी लागते. यातून संतांची देखील सुटका नाही. संत तुकाराम महाराज म्हणतात,
“काम क्रोध आम्ही वाहिले विठ्ठलीं । आवडी धरिली पायांसवें ॥१॥ आतां कोण पाहे मागें परतोनि । गेले हारपोनि देहभाव ॥ध्रु. ॥”
☆ “याति कुळ माझे गेले हारपोनी!!” ☆ श्री संभाजी बबन गायके ☆
– सौरभ सिंह शेखावत – दीपेंद्र सिंग सेंगर
१७, मराठा लाईट इन्फंट्री मध्ये सेकंड लेफ्टनंट म्हणून रुजू झालेले झालेला हा तरणाबांड अधिकारी जीवनात आणखी काहीतरी मोठं करू इच्छित होता. सैनिक झालोच आहोत तर प्रत्यक्ष युद्धाचा प्रसंग अनुभवणे गरजेचे आहे! म्हणून जिथं हे सर्व अनुभवयला मिळेल ते दल म्हणजे स्पेशल फोर्स! … आणि सुदैवाने तशी संधी लाभली. कर्नल क्लिमेंट सम्यूएल साहेबांनी परवानगी दिली.
नहान, हिमाचल प्रदेश येथे असलेल्या स्पेशल फोर्सेस ट्रेनिंग स्कूल या प्रशिक्षण केंद्रात सेकंड लेफ्टनंट साहेबांचा आजचा पहिलाच दिवस. प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षणासाठी आलेले अधिकारी कितीही मोठे असोत… त्यांचे खरे बॉस म्हणजे मैदानावर प्रशिक्षण देणारे एन. सी. ओ. अर्थात नॉन कमिशन्ड ऑफिसर्स… जे शिपाई पदावरून प्रगती करीत करीत, अनुभव गाठीला बांधत बांधत इथवर पोहोचलेले असतात आणि अर्थातच वयाने ज्येष्ठ असतात!
सेकंड लेफ्टनंट साहेब राजस्थानी आणि प्रशिक्षण देणारे एन. सी. ओ. साहेब उस्ताद हवालदार हनुमान राम राजस्थानीच. त्यांनी लेफ्टनंट साहेबांना विचारलं… तुमचं नाव? त्यावर साहेबांनी नाव सांगितलं. लगेच दुसरा प्रश्न आला… ”धर्म, जात? ” खरं तर नावावरून त्या एन. सी. ओ. साहेबांनी लेफ्टनंट साहेबांची जात ओळखली असावी, असं वाटणं साहजिकच होतं… पण तरीही ते विचारत आहेत.. म्हणून साहेबांनी सांगितलं… हिंदू राजपूत!
त्यावर एन. सी. ओ. साहेबांनी म्हटलं… ” ते पाण्याचं डबकं दिसतंय ना.. ते पवित्र पाणी आहे… त्यात एक बुडी मारून पवित्र होऊन या! ” आणि जाताना पळत नाही जायचं… रोलिंग करत म्हणजे जमिनीवर कोलांट्या उड्या मारत जायचं… जा! ”
“कमाल आहे! आल्या आल्या ही शिक्षा? ” साहेबांनी मनातल्या मनात म्हटलं आणि ते त्या डबक्याकडे गेले. काळं, घाण पाणी… त्यात ग्रीस सारखं काहीतरी तरंगते आहे. वास तर भयानक! पण आज्ञा पाळायला तर पाहिजेच… सेकंड. लेफ्टनंट साहेबांनी डुबकी मारली आणि पुन्हा रोलिंग करीत येऊन एन. सी. ओ. साहेबांसमोर सावधान स्थितीत उभे राहिले! एन. सी. ओ. साहेबांनी पुन्हा जात, धर्म विचारला! … या साहेबांना वाटले की आधीच्या वेळी त्यांना नाव, जात नीटसे ऐकू गेले नसावे… त्यांनी पुन्हा सांगितले… सर, मी राजपूत जातीचा आहे!
यावर एन. सी. ओ. साहेबांनी पुन्हा एक डुबकी मारून यायला सांगितले… साहेबांनी पुन्हा तसं केलं.. असं दोन, तीन वेळा झाल्यावर मात्र साहेबांनी मानत विचार केला… आणि सभोवार पाहिलं! प्रशिक्षण केंद्राच्या भिंतीवर लिहिलं होतं… ’कमांडो कंट्री सर्व विथ प्राईड’
आता मात्र त्यांनी बरोबर उत्तर दिलं, ”उस्ताद, माझा धर्म स्पेशल फोर्सेस, माझी जात स्पेशल फोर्सेस! ”
यावर उस्ताद गोड हसले आणि म्हणाले, ”मी म्हटलं होतं ना… ते पाणी पवित्र आहे… डुबक्या मारल्या की आपोआप ज्ञान प्राप्त होतं! ”
उस्ताद पुढं म्हणाले, ”तुमचे सैनिक ज्या जातीचे तीच तुमची जात आणि धर्म. तुम्ही भारतीय सैन्यातील विविध रेजिमेंटस, बटालियन्स मध्ये नेतृत्व करायला जाणार आहात. तुमच्या अखत्यारीत असलेल्या सैनिकांची जी जात असेल, त्यांच्या ज्या पूजा पद्धती असतील, आहार पद्धती असतील, धार्मिक पध्दती असतील… त्याच तुमच्याही असतील. त्यांच्याशी एकरूप झाल्याशिवाय तुम्हांला त्यांच्याकडून अपेक्षित कामगिरी करून घेता येणारच नाही! ”
एका अनुभवी प्रशिक्षकांनी दिलेली ही शिकवण त्यावेळी सेकंड लेफ्टनंट असलेले सौरभ सिंग शेखावत कधीच विसरले नाहीत! इथे त्यांना आणखी एक शिकवण मिळाली… सोबत्याला कधीही मागे एकटे सोडायचे नाही… भले त्यासाठी प्राणांची आहुती द्यावी लागली तरी बेहत्तर! सैनिक नेहमी जोडीजोडीने कामगिरी करतात. सहकारी जखमी झाला तर त्याला सुरक्षित स्थळी पोहोचवण्याची जबाबदारी साथीदाराचीच असते.
शेखावत साहेब हे सर्व नेतृत्वगुण शिकत शिकत पुढे जात होते. स्पेशल फोर्सेसमधील प्रशिक्षणादरम्यान त्यांची शस्त्रे कायम सज्ज स्थितीमध्ये असतात… म्हणजे फायर करण्यासाठी तयार असतात!
बरेच दिवस उलटून गेले होते… पण शेखावत साहेबांना प्रत्यक्ष शत्रूवर फायर करण्याची संधी काही मिळत नव्हती… आणि ते तर त्याचसाठी स्पेशल फोर्सेसमध्ये आले होते. त्यांचे प्रोबेशन संपले तरी तसं काही घडेना. एकेदिवशी ते आसाम भागातल्या एका रेल्वे स्टेशनजवळ तैनात असतानाच त्यांना त्यांचे सिनिअर ऑफिसर दीपेंद्रसिंग सेंगर साहेबांचा मेसेज आला… आपली टीम घेऊन ताबडतोब मी सांगतो त्या ठिकाणी पोहोचा… मी पुढे निघतो आहे! ”
सेंगर साहेबांना एक पक्की खबर मिळाली होती… ULFA (United Liberation Front of Asom) या सशस्त्र अतिरेकी संघटनेचे आठ-दहा अतिरेकी एका घरात थांबल्याचे आणि लवकरच ते तिथून निसटून जाण्याच्या तयारीत आहेत. सेंगर साहेबांनी ज्या व्यक्तीने ती खबर आणली होती, त्याला ताबडतोब त्यांच्या वाहनात बसवले आणि ते निघाले… जसे होते तसे. म्हणजे त्यावेळी सेंगर साहेब अर्धी विजार, टी-शर्ट आणि पायांत साध्या रबरी स्लीपर्स अशा वेशात होते… पण अतिरेकी पळून जातील म्हणून घाई होती! आणि अतिरेक्यांना संशय येऊ नये म्हणून त्यांनी लष्करी वाहन न घेता एक खाजगी वाहन वापरण्याचा निर्णय घेतला होता. त्यांनी खबरी माणसाला बजावलं होतं… त्या घराच्या आधी चार पाचशे मीटर्सवर गाडी थांबवायला सांग… आम्ही तिथून पुढे पायी जाऊन कारवाई करू! परंतू तो माणूस इतका गडबडून गेलेला होता की… त्याने सेंगर साहेबांना थेट त्या अतिरेक्यांच्या घरासमोरच नेले! घराच्या अंगणात, खुर्च्यांवर दहा-बारा जण छान चहा-नास्ता करीत बसलेले दिसले. आता एक क्षणही गमावून चालणार नव्हते. सेंगर साहेब वाहनातून तसेच खाली उतरले आणि थेट त्या अतिरेक्यांच्या दिशेने निघाले… त्यांचा वेश पाहून त्या अतिरेक्यांना सुरुवातीला अजिबात संशय आला नाही. सेंगर साहेबांनी खांद्यावर लटकवलेली रायफल झटक्यात काढली आणि गोळीबार सुरु केला. पहा-यावर उभ्या असलेल्या अतिरेक्याला उडवले! आता अतिरेकी सावध झाले… त्यांनीही जोरदार प्रत्युत्तर दिले! अगदी दोन, तीन मीटर्सवरून गोळीबार झाला. अतिरेकी तिथून पळाले…!
शेखावत साहेब सेंगर साहेबांच्या वाहनापासून पाचशे मीटर्सचे अंतर मुद्दाम ठेवून लष्करी वाहनातून चाललेले होते. त्यांनी गोळीबाराचा आवाज ऐकला आणि वाहनाचा वेग वाढवला… तो त्यांच्याच दिशेने सात-आठ अतिरेकी पळत येताना दिसले. आधी समजेना हे लोक स्थानिक गावकरी आहेत की कोण ते! शेखावत साहेबांच्या समवेत असलेल्या जवानांची सुद्धा प्रत्यक्ष शत्रूवर गोळीबार करण्याची ही पहिलीच वेळ होती… शेखावत साहेबांनी ओरडून या जवानांना सावध केले आणि त्या सर्वांनी त्यांच्या आयुष्यात पहिल्यांदा शत्रूवर गोळ्या झाडल्या!
शेखावत साहेब तिथून घटनास्थळी पोहोचले… सेंगर साहेब रक्ताच्या थारोळ्यात पडलेले होते. त्यांच्या पोटातून एके-४७ रायफलच्या सात-आठ गोळ्या आरपार निघून गेलेल्या होत्या… जवळून गोळीबार झाल्याने तसं झालं होतं. स्पेशल फोर्सेसच्या सैनिकांना, अधिका-यांना उच्च दर्जाचे वैद्यकीय प्रशिक्षणही दिले जाते. शेखावत साहेबांनी सेंगर साहेबांवर आवश्यक ते उपचार केले… पुढे त्यांना उपचारांसाठी हलवण्याची सर्व व्यवस्था अगदी त्वरेने केली. आधी चार चाकी वाहन, पुढे लष्कराचे हेलीकॉप्टर असा प्रवास सेंगर साहेबांनी प्रचंड वेदना सहन करीत पूर्ण केला. पंधरा तास शस्त्रक्रिया चालली. इंग्लीश भाषेत To “have guts” means to possess courage, bravery, and determination when facing danger, difficulty, or uncertainty. It signifies having the audacity, grit, or willpower to take risks. अर्थात धोका पत्कारण्यासाठी अंगी धमक असणे. यातील guts या शब्दाचा दुसरा अर्थ आहे… आतडे! सेंगर साहेबांना सेनेचे डॉक्टर gut शब्दाचा श्लेष साधत म्हणाले… ”You have lots of guts… so we cut some it! ” कठीण परिस्थितीत सुद्धा विनोद बुद्धी शाबूत ठेवणारे सैनिक आणि डॉक्टर्स भारतीय सैन्यातच आढळतात! सेंगर साहेबांच्या आतड्याचा मोठा भाग कापून काढण्यात आला. आणि हे आतडे नैसर्गिक शरीरधर्म साधण्यासाठी बाहेर काढून पिशव्यांना जोडण्यात आले!
धर्मनिरपेक्ष भारतीय सैन्याला वंदन. आणि ह्या परंपरा जीवाचे मोल देऊन पाळणा-या सैनिक, अधिका-यांना दंडवत. ज्ञानेश्वर माऊली एका अभंगात म्हणतात… याति कूळ माझे गेले हारपोनि… माजी जात, माझे कूळ मी विसरून गेलो आहे… श्रीरंगावाचून आनु नेणे! अर्थात श्रीरंग श्रीकृष्ण यांच्याशिवाय मला दुसरे काहीही ठाऊक नाही! भारतीय सैनिकांची हीच मनोवृत्ती आहे. त्यामुळेच जातीय, धार्मिक कट्टरतावाद जोपासत भारतावर चालून येणा-या शत्रूला आपले सैनिक भारी पडतात! जय हिंद. जय हिंद की सेना.