मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ अडगळीत गेलेले शब्द — ☆ डॉ. धनंजय देशपांडे ☆

डॉ. धनंजय देशपांडे

? इंद्रधनुष्य ?

☆ अडगळीत गेलेले शब्द — ☆ डॉ. धनंजय देशपांडे 

‘अडगळीत गेलेले शब्द’ हे शीर्षक लिहिताच लक्षात आले की अडगळ हा शब्दच अडगळीत गेला आहे. पूर्वी प्रत्येक घरात एक अडगळीची खोली असायची. सगळ्या नको असलेल्या, परंतु कधीतरी कामास येणार्‍या वस्तू तेथे जाऊन पडायच्या.

.

पण 1 BHK अथवा 2 BHK¨च्या जमान्यात अडगळ सरळ भंगारवाल्याकडे जाते.

.

जुनी घरे आठवताच तसे शब्द खूपच आठवायला लागतात. ओटी, ओसरी, पडवी, परसू, माजघर, बळद, कोठीघर हे शब्द विसरायला झाले आहेत.

.

माळा (आताच्या मराठीत अँटिक, पाण्याची अवैध सिंटेक्स टाकी लपवण्याचं ठिकाण) ही पूर्वी अभ्यासाची जागा पण असायची.

.

तसंच आता व्हेंटिलेटर फक्त हॉस्पिटल किंवा थिएटर मधेच दिसतो. दरवाज्यावर एक झरोकावजा खिडकी असायची हवा खेळती रहाण्यासाठी, तिला व्हेंटिलेटर म्हणायचे हे थोड्यांनाच माहीत असेल.

.

‘वळचण’ हा असाच एक अडगळीत गेलेला शब्द. वळचण म्हणजे छपराचा भिंतीच्याही पुढे आलेला भाग. ऊन-पावसापासून घराचे संरक्षण होण्यासाठी तो तसा ठेवलेला असायचा.

.

घराची वळचण ही गुरा-ढोरापासून आगंतुकापर्यंत सगळ्यांचं विसाव्याचं ठिकाण होतं. कोणीही तेथे विश्रांती घ्यावी असं.

.

पागोळं म्हणजे काय? वळचणीवर पाऊस पडल्यानंतर बहुतेक पाणी ‘पन्हळी’ तून जमिनीत जातं. पण तरीही बरेच चुकार थेंब पन्हळीतून न येता इकडून तिकड़ून खाली येतात – ती पागोळी.

.

‘फडताळ’… फडताळ म्हणजे भिंतीतील कपाट. खुंटी, कोनाडे, देवड्या हे असेच अडगळीत गेलेले शब्द.

.

जुन्या घरातील न्हाणीघर (बाथरूम) असंच. ऐसपैस चुलाण्यावर पंचवीस-तीस लिटरचा हंडा तापत असायचा. दगडी चौरंग, अंग घासायला ‘वज्री’, ‘घंगाळ’ असायचे. तेही असेच कालबाह्य झाले.

.

गृहिणीची कुंकवाची पेटी, त्यातील आरसा, फणी, करंडा, मेणाच्या डाबल्या सहित गडप झाली. सामान्य स्त्रीला शृंगारासाठी एवढं साहित्य पुरेसं व्हायचं. आता व्हॅनिटी बॉक्सेस आल्या. प्रसाधनं त्याच्यात, डोळ्यात व दुकानात मावेनाशी झाली.

.

लहान मुलीच्या वेण्या घट्ट लोकरीच्या धाग्याने बांधल्या जायच्या, त्याला

‘आगवळ’ म्हणायचे. हाही शब्द अडगळीतच गेलेला.

.

स्वयंपाकघरातील चूल गेली त्याचबरोबर चूल, वैल, निखारे हे शब्दही गेले.

.

स्वयंपाकघरातील सतेली, तपेली, कथली, रोवळ्या, गंज हे शब्द आठवेनासे झाले.

.

ओगराळं हा शब्दही असाच अडगळीत गेलेला.

.

पंचपाळे, चौफुले, कावळे हे सगळे हरवले.

.

देवघराबरोबर सहाण, गंधाची थाटी गायब.

.

‘काथवट’ हा शब्द तर इतिहासजमा झालेला. काथवट म्हणजे लाकडी परात, हिंदीतली ‘मन चंगा तो कथोटी में गंगा’ ही म्हण त्यावरूनच आलेली.

.

कपड्यांचा विचार करताना तठव, जाजम, बसकर, सुताडे सगळे हरवून गेलेले. सोवळ्यात नेसण्याचा पितांबर हा शब्द ऐकू येतो,

.

पण उत्तरवस्त्र पाभरी’ हरवून गेली.

.

सोवळ्यात नेसण्याची ‘धाबळी’ सोवळ्याबरोबर कालबाह्य झाली.

.

सोन्याचे भाव गगनाला भिडले आणि जुने सोन्याचे अलंकार विसरले गेले.

.

कोठीघरातील कोठय़ा आहेत; पण कणग्या, ढोल्या – ज्यात भरपूर धान्य भरलेले असायचे – त्या गडप झाल्या.

.

सूप खुंटीवरून बाउल मधे आलं.

.

एखाद्या वर्षी जेव्हा शेतात खूपच भरपूर धान्य येईल तेव्हा अडीअडचणीसाठी अंगणात मोठेमोठे ‘पेव’ खणून त्यात ते धान्य साठविले जाई. एकेका पेवात कमीत कमी दहा-दहा पोते साठविले जाई.

.

जेवण्याची पितळी, वाटकावन, बसकर, माडक्यांची उतरंड, फुंकणी, उखळ, मुसळ, खल आणि बत्ता, जातं, खुंटा, पावशेरा, शेर, मण, गुंज, आतपाव, छटाक वगैरे गायब झाले.

बदलत्या काळाबरोबर पिकदानी सोडून सगळीकडे बिनधास्त आणि बिनदीक्त पान, पणपराग आणि माव्याच्या पिचकाऱ्या टाकणे हा जणू आता हक्क झाला आहे.

‘अ’ अडकित्त्याचा हळूहळू हद्दपार होऊ घातला आहे.

उंचीवर घर असेल तर घरात प्रवेश करण्यासाठी उताराचा रस्ता असायचा त्याला चोप म्हणत असत.. घरात प्रवेश केल्यावर लगेचच दोन्ही बाजूला बैठक असायची, तिला ढाळज किंवा ढेळज म्हणत.. हे पण अडगळीतील नावे आहेत…

.

लाइट आले आणि अनेक तर्‍हेचे दिवे गडप झाले. काळानुसार आणि गरजेनुसार असे अनेक शब्द गडप होत असतात तसेच खूप नवेनवे शब्दही वापरात येत असतात. भाषा ही सतत समृद्धच होत असते. विकास आणि प्रगती ही सतत चालूच राहणार आहे, फक्त गेल्या अर्धशतकात पूर्वी प्रचलित असलेल्या पण विसरल्या गेलेल्या शब्दांची सहज आठवण झाली म्हणून हा सारा शब्दप्रपंच, इतकेच…


संकलक / लेखक : डॉ. धनंजय देशपांडे (dd)

(सायबर सिक्युरिटी तज्ञ, चित्रकार, लेखक, समुपदेशक, निवेदक)

मो न. ९४२२३०४३४४ 

1) Global Cyber Crime Helpline National Award winner

2) Digital Hero of the year National Award winner

3) HOD: Cyber Awareness Foundation, Maharashtra State

4) Mentor: Pune University (SPPU), CANADA and UK

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ श्री रविंद्रनाथ टागोर यांची “गीतांजली”… भाग – १३ ☆ डॉ. शोभना आगाशे ☆

डॉ. शोभना आगाशे

? इंद्रधनुष्य ?

☆ श्री रविंद्रनाथ टागोर यांची “गीतांजली”… भाग – १३ ☆ डॉ. शोभना आगाशे ☆

श्री रविंद्रनाथ टागोर  

*

रविंद्रनाथ टागोर हे जगातले एकमेव असे कवी आहेत, ज्यांनी रचलेल्या दोन काव्यांना भारत व बांगलादेश या दोन राष्ट्रांनी आपले राष्ट्रगीत म्हणून मान्यता दिली आहे. परंतु का कोण जाणे, पण त्या काळातील तथाकथित विचारवंतांमध्ये टागोरांबद्दल गैरसमज फार होते व कदाचित ते जाणून बुजून पसरविलेही जात होते. कदाचित टागोर एका उच्चशिक्षित, सुखवस्तू, जमिनदार घरात जन्मले होते, त्यांचे बंधू ब्रिटिश सरकारमधे अंमलदार होते, त्यांच्या वडिलांची उच्च सरकारी अधिकाऱ्यांत उठबस होती म्हणून असेल. त्यांना नोबेल पुरस्कार मिळाला म्हणून असेल.

सुरवातीच्या काळात ते सरकारवर फारशी जहाल टीका जाहीरपणे करत नसत. जे कांही म्हणायचं ते आपल्या लेखनातून, काव्यातून म्हणत. “जनगणमन अधिनायक जय हे” हे गीत टागोरांनी इंग्रज बादशहाच्या स्वागतासाठी लिहिलं होतं हा गैरसमज आजही कित्येकांच्या मनात आहे. पण त्यांनी ब्रिटिश राजवटीविरोधात लिहिलेल्या लेखांना तेवढी प्रसिद्धी मिळाली नाही. ब्रिटिश युवराज भारतात आले तेव्हा टागोरांनी म्हटलं होतं, “स्वतःच्या बळाचं प्रदर्शन करणाऱ्या राजाचं स्वागत करणं म्हणजे कैद्यांच्या पंगतीला मेजवानी म्हणण्यासारखं आहे. “

ब्रिटिश साम्राज्यशाहीने भारतीयांना स्वत्वहीन करून टाकले होतं व गोऱ्या कातड्याच्या लांगूलचालनात उच्चभ्रू समाज धन्यता मानत होता. यावर १८८४ साली, वयाच्या अवघ्या चोविसाव्या वर्षी त्यांनी तत्कालीन कॉंग्रेसच्या धुरिणांना उद्देशून लिहिलं होतं की, इंग्रजांपेक्षा स्वतःला हीन दीन समजून वागणारे लोक त्यांच्यापुढे हात जोडून “आम्हाला बरोबरीचा दर्जा द्या” अशी मागणी करणार आहेत काय? आम्ही स्वत:च्या हिमतीवर आपली, आपल्या देशाची प्रतिष्ठा वाढवू शकणार नाही काय? जे स्वतःचा मान स्वतः राखू शकत नाहीत, त्यांचा मान राखायला परके येणार आहेत काय? का आपण स्वभाषेत बोलत नाही? का स्वदेशी वस्त्रं वापरत नाही? का म्हणून आम्हीच आमच्या मनात स्वदेशाची घृणा बाळगतो? ” असा विचार करणारा व ते बोलणारा, लिहिणारा कवी ब्रिटिश राजासाठी स्वागतगीत लिहिल का?

रविंद्रनाथांनी उत्तम इंग्रजी येत असूनही, वयाच्या पन्नाशी पर्यंत फक्त बंगाली भाषेतून लिहिलं व बंगालीतूनच भाषणं केली. पण त्याचवेळी उत्तम इंग्रजी कविता, धर्मोपसानेचे संस्कृत मंत्र, संत तुकारामांचे अभंग इ, साहित्य आपल्या वंग बांधवांसाठी बंगालीत भाषांतरित केले.

जालियनवाला बागेतील हत्याकांडानंतर त्यांनी आपला ‘सर’ हा किताब परत केला होता हे सर्वांना ठाऊक आहे पण वयाच्या ८०व्या वर्षी मृत्युशय्येवरून त्यांनी लिहिलेले (कृष्ण कृपलानींकडून लिहून घेतलेले), ब्रिटिश राजवटीला सणसणीत चपराक मारणारे त्यांचे अनावृत्त पत्र मात्र कुणाला फारसे ठाऊक नाही. दुर्दैवाने त्यानंतर दोनच महिन्यांनी ते वारले. पण या पत्रात त्यांनी “आधी भारतीयांचे शोषण थांबवा, त्यांना स्वतंत्र करा आणि मगच नाझींच्या विरुद्ध लढायला बोलवा” अशी जी मागणी केली होती त्याचाच स्फोट म. गांधींच्या ८ ऑगस्ट १९४२च्या ‘चले जाव’च्या भाषणात झालेला दिसला.

मनाला झोंबणाऱ्या भावनांना आपल्या गीतातून वाचा फोडणाऱ्या या महाकवीची “आमि भय करबोना” सारखी गीतं गात हजारो बंगाली तरूण वंगभंगाच्या चळवळीत पोलिसांच्या लाठ्या खात होते. “आमार शोनार बांगला” “ऍकला चलो रे” ही त्यांची सुप्रसिद्ध स्फूर्तीदायक गाणी याच चळवळीतली!

(संदर्भ – रविंद्रनाथ: तीन व्याख्याने, ले. पु ल देशपांडे)

—– 

☆ गीत : ३७ ☆

I THOUGHT that my voyage had come to its end at the last limit of my power, ⎯ that the

path before me was closed, that provisions were exhausted and the time come to take 

shelter in a silent obscurity.

But I find that thy will knows no end in me. And when old words die out on the tongue,

new melodies break forth from the heart; and where the old tracks are lost, new country is revealed with its wonders.

—– 

☆ मराठी भावानुवाद : गीत: ३७ ☆

*

वाट संपली, प्रवास थांबला

डळमळला विश्वास आतला

हीच वेळ कां चिरनिद्रेची?

*

तान थबकता ओठावरची

सरगम उसळे हृदयांतरीची 

असेल कशी ही खूण अंताची?

*

वाट हरवता वाटेवरची

निर्मिती होते नव विश्वाची

अंतच हा नां त्या अंताचा? सांग तूचि!

*

भावानुवाद ©️ शोभना आगाशे

संपर्क: ९८५०२२८६५८

—– 

☆ गीत ३८ ☆

THAT I want thee, only thee ⎯ let my heart repeat without end. All desires that distract 

me, day and night, are false and empty to the core.

As the night keeps hidden in its gloom the petition for light, even thus in the depth of my unconsciousness rings the cry ⎯ I want thee, only thee.

As the storm still seeks its end in peace when it strikes against peace with all its might,

even thus my rebellion strikes against thy love and still its cry is ⎯ I want thee, only 

thee

—–  

☆ मराठी भावानुवाद : गीत ३८ ☆

*

रात्रीच्या गर्भात, प्रकाशाचा हव्यास

तशी माझ्या मनी, तुझीच रे आस

मला तू हवास, मला तू हवास॥

*

शांत हवा अंत, जसा वादळास

तुझी ओढ वेगे, माझ्या प्रेमास

मला तू हवास, मला तू हवास॥

*

विचलित मन, करण्या प्रयास

वासनांचा दाह, कर्मांचा फास

मला तू हवास, मला तू हवास॥

*

मिथ्या जग, आसक्ती कशास

चिरंतन माझ्या, मुखी हा ध्यास

मला तू हवास, मला तू हवास॥

*

भावानुवाद ©️ शोभना आगाशे

संपर्क: ९४५०२२८६५८

—– 

☆ गीत ३९ ☆

WHEN the heart is hard and parched up, come upon me with a shower of mercy.

When grace is lost from life, come with a burst of song.

When tumultuous work raises its din on all sides shutting me out from beyond, come to 

me, my lord of silence, with thy peace and rest.

When my beggarly heart sits crouched, shut up in a corner, break open the door, my king, and come with the ceremony of a king.

When desire blinds the mind with delusion and dust, thou holy one, thou wakeful, come 

with thy light and thy thunder.

—–

मराठी भावानुवाद : गीत ३९

*

मन माझे होता शुष्क अन् कठोर

वर्षाव दयेचा करी मजवरती

*

आनंदास होता पारखा या जीवनी

गीत रंगांची उधळण कर ती

*

जो तुज अंतरतो, कोलाहल दैनंदिनीचा

असह्य होता, दे शांती अन् विश्रांती 

*

दीन माझे मन, जखडले धरणीशी

तोड दार, दाखव सत्ता, हो अधिपती

*

वासनांचे जर उठेल मोहोळ 

ने प्रखर प्रकाशी, देण्यास जागृती

*

– क्रमशः भाग १३.

मूळ इंग्लिश काव्य : श्री. रविंद्रनाथ टागोर.

भावानुवाद : कवयित्री : © शोभना आगाशे

सांगली 

दूरभाष क्र. ९८५०२२८६५८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ‘कँडी यांचा अदृश्य स्पर्श…’ ☆ डाॅ. मीना श्रीवास्तव ☆

डाॅ. मीना श्रीवास्तव

? इंद्रधनुष्य ?

☆ ‘कँडी यांचा अदृश्य स्पर्श…’ ☆ डाॅ. मीना श्रीवास्तव ☆

मेजर जेम्स थॉमस कँडी 

कँडी यांचा अदृश्य स्पर्श – – 

*

मराठी भाषेत आपण किती सहज वापरतो – – 

स्वल्पविराम, पूर्णविराम, प्रश्नचिन्ह, उद्गारचिन्ह.. …

*

– – या विरामचिन्हांची शिस्तबद्ध सुरुवात एका ब्रिटिश अधिकाऱ्याने केली!

ते डेक्कन कॉलेज पुणे चे प्राचार्य सुद्धा होते..

त्यांचे नाव “मेजर जेम्स थॉमस कँडी” 

१८व्या-१९व्या शतकात मराठी लेखन सलग असायचे… 

दंड (|) आणि द्विदंड (||) एवढीच चिन्हे वापरली जात.

इंग्रजी भाषेच्या प्रभावानंतर पुढील चिन्हे मराठीत रूढ झाली :

स्वल्पविराम (,)अर्धविराम (;) पूर्णविराम (.) प्रश्नचिन्ह (?) उद्गारचिन्ह (!) इत्यादी…

– – मात्र कँडी यांनी १८५० साली ‘विरामचिन्हांची परिभाषा’ ही पुस्तिका लिहून मराठी लेखनाला नवा श्वास दिला.

– – वाक्याचा अर्थ स्पष्ट व्हावा, वाचन सुलभ व्हावे, आणि लेखनाला शिस्त लाभावी, यासाठी त्यांनी नियम तयार केले.

आज आपण लिहितो त्या प्रत्येक वाक्यात कँडींचा अदृश्य स्पर्श आहे!

विरामचिन्हांची परिभाषा ही १६ पानी पुस्तिकाच त्यांनी लिहीली, मराठी इंग्लिश शब्दकोश निर्मीतीमधे

त्यांचे अमुल्य योगदान आहे 

२६ फेब्रुवारी रोजी त्यांचे १५० वे स्मृतिवर्ष असेल.

मराठी लेखन समृद्ध करणाऱ्या या व्यक्तिमत्त्वाला विनम्र अभिवादन!!!

 

©  डॉ. मीना श्रीवास्तव

ठाणे

मोबाईल क्रमांक ९९२०१६७२११, ई-मेल – drmeenashrivastava21@gmail.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “ही लढाई अनिवार्य!” भाग – २ ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य 

☆ “ही लढाई अनिवार्य!” भाग – २ ☆ श्री संभाजी बबन गायके

कॅप्टन राकेश वालिया 

(स्वत:चे घरही झालेले नव्हते. मुलगा अजून हाताशी यायचा होता. एक मारुती गाडी चालवायला घेतली. पुढे प्रवासी व्यवसायात उडी घेतली. पुढे नागरी विमान वाहतूक क्षेत्रात संधी मिळवली… आणि यश मिळायला आरंभ झाला.) 

इथून पुढे – – 

जीवनात मोठी मजल मारली होती. हा अनुभव शब्दबद्ध करण्याची उर्मी दाटून आली मनात. त्यानुसार जुळवाजुळव करीत पुस्तक प्रकाशित केलेही. लाखो शब्दांची कहाणी हजारो शब्दांत आणताना कसरत करावी लागली. तोवर विविध ठिकाणी प्रेरणादायी व्याख्याने देण्याची संधी मिळत होती… नाव होत होते. स्वत;चे घर झाले होते. एकूणच आयुष्य आता सुखात जाईल, अशी चिन्हे होती. पण पत्नीच्या गंभीर आजारात मोठी रक्कम खर्ची पडली… तिचे हाल बघवत नसतानाही आशा न सोडता उपचार सुरु ठेवले होते. पुस्तकाला प्रतिसाद तर उत्तमच लाभला. पण मध्येच कोरोना महामारी उपटली. घरातील सर्वच या कचाट्यात सापडले. यातून आर्थिक नाकाबंदी होत गेली. इंग्रजी पुस्तकाचे हिंदीत भाषांतर करून देण्यात मदत करेन, पुस्तकाचे प्रमोशन करेन असं सांगत एक महिला संपर्कात आली. आधी फोनवर होणा-या संभाषणातून चर्चेची गाडी प्रत्यक्ष भेटण्यावर आली. माझा नवरा आणि मी येते असे म्हणाली. आपल्या छोट्याशा मोटारीतून जाऊन साहेब त्या महिलेला भेटले. काही कारणांनी नवा-याला येणे जमले नाही… म्हणून ती महिला एकटीच आली होती. सर्वसामान्य सभ्य महिलांचा पोशाख अंगावर, उत्तम संभाषण कौशल्य तिच्याकडे होतेच. जुजबी चर्चा झाल्यावर नंतर भेटू असे ठरत असतानाच त्या महिलेने आणखी चर्चा करण्यासाठी एखाद्या हॉटेलात बसू असे सुचवले. इथे शंका आली. नम्र नकार देत साहेबांनी त्या महिलेला मोटारीतून दिल्लीतल्या एका पोलिस स्टेशनसमोरच सोडले. तिला तिथेच जवळपास काही काम होते, असे तिने सांगितले होते म्हणून. हा प्रवास केवळ सुमारे पंचवीस मिनिटांचा होता. साहेब घरी पोहोचले आणि त्यांना त्या पोलिस स्टेशनमधून फोन आला… एका महिलेने बलात्काराची फिर्याद गुदरली आहे… त्वरीत या.. अन्यथा हातकड्या घालून घेऊन येऊ! पलीकडून पोलिसी खाक्या बोलला. महिलेचे नाव विचारले तर भलतेच नाव सांगितले गेले. साहेब थेट पोलिस स्टेशनात धडकले. ती महिलाही तिथे होती… जी त्यांच्या पुस्तकाच्या प्रमोशनसाठी त्यांना मदत करणार होती. “यांनी मला पेयातून गुंगीचे औषध पाजून माझ्यावर चालत्या मोटारीत लैंगिक अत्याचार केले… अशी फिर्याद होती. मामला अत्यंत गंभीर होता. अटक… बदनामी… खटला… आणि तुरुंगवास ठरलेला होता. अचानक बॉम्ब पडल्यावर कानठळ्या बसतातच… कारण कानांवर हात ठेवायला फुरसत मिळत नाही. इथेही असेच झाले. ती महिला मोटारीत बसली असताना जवळजवळ वीस मिनिटे दुस-या फोनवरून कुणाला तरी मेसेज करीत असल्याचे साहेबांनी पाहिले होते… त्यांच्या लक्षात हा डाव यायला वेळ लागला नाही. तेवढ्यात साहेबांच्या मुलाचा फोन आला… त्याला मेसेज गेला होता… तुझ्या वडिलांनी गुन्हा केला आहे!

पोलिसांनी त्या महिलेचीही चौकशी चालवली होती. पण सामान्य प्रश्नाला ती भलतीच उत्तरे देत होती… तपासात सहकार्य करायला राजी नव्हती. नशिबाने पोलिसांनी साहेबांविरुद्ध अटक करण्याची जरुरी नसलेले warrant जारी केले आणि खटल्याला सामोरे जाण्याची सुचना केली. पोलिसांना साहेबांचा काही दोष असल्याचे दिसत नव्हते. पंचवीस मिनिटांच्या मोटार प्रवासात महिलेला गुंगी आणणारे पेय देणे, तिला गुंगी येणे, छोट्या मोटारीच्या आसनावर तिला नेऊन तिच्यावर अत्याचार करणे आणि तिला भरवस्ती असलेल्या रस्त्याने आणि त्यात डिसेंबर न्यू इअरसाठी लावलेल्या पोलिसी बंदोबस्ताच्या नाकाबंदीमधून आणून पोलिस स्टेशन समोर उतरवणे… आणि मग त्या महिलेने काही वेळाने त्याच पोलिस स्टेशनमध्ये जाऊन बलात्काराची तक्रार नोंदवणे… आणि या लेखी तक्रारीच्या अर्जावरचे अक्षर सुबक, नीटस आणि अगदी तपशीलवर वर्णन करणारे होते… जणू काही हा अर्ज आधीच तयार करून ठेवलेला होता… गोष्टी काही जुळत नव्हत्या.

साहेब घरी आले. पत्नीला, मुलाला परिस्थिती सांगितली. मित्रांशी चर्चा केली. तेवढ्यात त्या महिलेच्या तथाकथित वकिलाचा फोन आला… ले दे के बात को रफा-दफा कर सकते हैं! ‘वकील’ महाशय बोलत होते. अर्थातच कर नाही त्याला डर नाही… या उक्तीने साहेबांनी त्याला नकार दिला. काही मित्रांनी, पोलिसांतल्या काही मार्गदर्शक लोकांनी ‘तात्पुरते फरार व्हा… मग पुढे पाहू’ असा सल्ला दिला… जो साहेबांनी लगेच धुडकावून लावला. जामिनासाठी अर्जही केला नाही. आणि पोलिसांनीही ना-अटक वारंट बजावल्याने अटकेची वेळ आली नाही.

पुढे खटला खालच्या न्यायालयात चालला. महिलांच्या बाजूचे असलेले काही कायदे या महिलेच्या बाजूने वागले. कायद्यांचा गैरफायदा घेतला जाऊ लागल्यावर कायदेही हतबुद्ध होतात! इथे साहेबांच्या विरोधात निकाल गेला… पण वरिष्ठ न्यायालयात दाद मागण्याची मुभा मिळाली!

तोवर मिडीया, लोकांत, नातेवाईक मंडळीत चर्चा तर झालीच होती. धूर आहे म्हणजे आग असणारच की… अशी घिसी-पिटी कहाणी इकडे तिकडे फिरली. साहेब नोकरी करीत असलेल्या आंतरराष्ट्रीय कंपनीने आता तुमच्या सेवेची गरज नाही, असे कळवले. प्रश्न केवळ पैशांचा नव्हता.. इभ्रतीचा होता!

पण फौजी साहेब गप्प बसणा-यातले नव्हते. त्यांनी त्यांच्या पद्धतीनेही समांतर तपास केला. लष्करी सेवेत असताना त्यांनी गुप्त माहिती विभागातही सेवा बजावली होतीच. संगणक प्रणाली वापरण्याचेही ज्ञान तोवर मिळवले होते. त्यांनी त्या महिलेची इत्यंभूत माहिती मिळवली. पैसे द्या… सर्व मिटवून टाकू म्हणाना-या त्या महिलेने अशा प्रकारचे सात-आठ खटले विविध प्रौढ व्यक्तींवर दाखल केल्याचे दिसून आले. संबधित पोलिसांनी प्रोटोकौल न पाळता घाईघाईने गुन्हे दाखल केल्याचेही दिसले. साहेबांनी सर्व माहिती गोळा केली. काही लोक बदनामीच्या भीतीने पैसे देऊन गप्प बसलेले होते. साहेबांनी दिल्लीतील एका स्वयंसेवी कायदा साहाय्य सेवेची मदत घेतली. एकम न्याय फौंडेशन नावाची ही संस्था असून दीपिका नारायण भारद्वाज नावाची तरुणी हे सेवाभावी काम करते. तोवर या महिलेच्या माध्यमातून साहेबांना ४७ वेळा फोन केले गेले… पैसे मागितले गेले… साहेबांच्या वकिलांना त्या महिलेचा वकील भेटायला आणि प्रकरण मिटवण्याचे बोलणे करूनही गेला होता! साहेबांच्या वकिलाने त्या वकिलाचे संभाषण रेकॉर्ड करून ठेवण्याची युक्ती मात्र वापरली, त्याचा फायदा झाला.

सुप्रीम कोर्ट मध्ये advocate अश्विनी कुमार दुबे साहेबांनी ‘आरोपी’ची बाजू मांडली. आरोपी आणि गुन्हेगार हे दोन वेगळे शब्द असतात. ज्याच्यावर आरोप केला गेलेला आहे तो गुन्हेगार असतोच असं नसतं. कायद्यांतील पळवाटा शोधून निष्पाप लोकांना अडकवून त्यांच्याकडून पैसे उकळणे ही सुद्धा एक प्रवृत्ती बनत चालली आहे, अशी शंका वाटते.

एका सेवानिवृत्त सैनिक अधिका-याच्या वाट्याला आलेले, २०२२ मध्ये सुरु झालेले हे दुष्टचक्र २०२५ मध्ये सुप्रीम कोर्टच्या सकारात्मक निकालाने संपले… आणि भारतीय सेनेसाठी जीवाची बाजी लावून आलेला एक सैनिक अधिकारी जीवनाच्या या मोठ्या युद्धात विजयी ठरला… एकम न्याय संस्था, श्रीमती दीपिका नारायण भारद्वाज, वकील अश्विनीकुमार दुबे साहेब यांचे आभार मानताना आपले कथानायक शूरवीर कॅप्टन राकेश वालिया (सेवानिवृत्त) यांचेही त्यांच्या never say die वृत्तीबद्दल अभिनंदन झालेच पाहिजे. त्यांनी सेवा बजावली त्या गोरखा पलटणमध्ये ‘‘कायर हुनु भांडा मरनु रमरो’ म्हणजे ‘ भिऊन जगण्यापेक्षा लढून मरणाला कवटाळणे उत्तम’ असं म्हटलं जातं… कॅप्टन राकेश वालिया (सेवानिवृत्त) न भिता लढले… आणि जिंकले! त्यांनी स्वत: पस्तीस मिनिटे न्यायसनाच्या डोळ्यांना डोळा भिडवून नीडर युक्तिवाद करीत आपली बाजू मांडली, हे विशेष! सन्माननीय सर्वोच्च न्यायालयाने वालिया साहेबांची निर्दोष मुक्तता केली आहे.

एकम न्याय कॉन्फरन्स संस्थेने वालिया साहेबांना ‘आयर्न स्पाईन ‘ (अर्थात पोलादी कणा असलेला माणूस). या पुरस्काराने गौरवण्यात आलेले आहे.

जय हिंद… जय हिंद की सेना.

– समाप्त –

 

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ मराठी भाषा गौरव दिन… ☆ प्रस्तुती – सुश्री विभावरी कुलकर्णी ☆

सुश्री विभावरी कुलकर्णी

🌈 इंद्रधनुष्य 🌈

☆ मराठी भाषा गौरव दिन… ☆ प्रस्तुती – सुश्री विभावरी कुलकर्णी ☆

महाराष्ट्रात २७ फेब्रुवारी हा दिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो. कवीवर्य कुसुमाग्रज अर्थात वि. वा. शिरवाडकर यांची आज जयंती.

या निमित्ताने आम्ही प्राथमिक शिक्षक शाळेत जे शिकवत असतो ते थोडे आपुलकीच्या माणसांना सांगावे वाटले. लहान मुलांना योग्य उच्चार शिकवले गेले नाहीत तर काय होते ते आपण सगळेच अनुभवत असतो. त्या साठी आम्ही प्राथमिक शिक्षक अगदी लहान वयाचे होऊन त्यांच्या वयाचा विचार करून काही गोष्टी सोप्या करून सांगतो. खूप वेळा त्यांच्यातले होऊन जावे लागते. आणि उच्चार चुकला तर काय गंमत होते आणि अर्थ कसा बदलतो हे दाखवावे लागते.

क, ख, ग, घ, ङ – यांना *कंठव्य* म्हणतात. कारण यांचा उच्चार करताना ध्वनि कंठातून निघतो. एकदा करून बघा.

च, छ, ज, झ, ञ- यांना *तालव्य* म्हणतात. कारण यांचा उच्चार करताना जीभ टाळू ला लागते.

एकदा करून बघा 

ट, ठ, ड, ढ, ण- यांना *मूर्धन्य* म्हणतात. कारण यांचा उच्चार जीभ मूर्धा ला लागल्याने होतो. एकदा म्हणून बघा.

त, थ, द, ध, न- यांना *दंतव्य* म्हणतात. यांचा उच्चार करताना जीभ दातांना लागते.

एकदा म्हणून बघा.

प, फ, ब, भ, म, – यांना *ओष्ठ्य* म्हणतात. कारण यांचा उच्चार ओठ जुळल्याने होतो. एकदा म्हणून बघा.

हे लहान मुलांना सांगून चालत नाही. त्यांच्या कडून म्हणवून घ्यावे लागते. शिक्षकाने उच्चारणे व मुलांनी मागे म्हणणे हा एक आनंद सोहळा असतो. हे सगळे प्रात्यक्षिक करून घ्यावे लागते. तरच त्यांचे उच्चार व लेखन योग्य होण्यासाठी मदत होते.

बरेचदा काही कविता तयार करून त्यातील गंमत दाखवावी लागते.

अशीच एक कविता.

बघा कशी वाटते..

*एक काना वाढला*

 *आणि अर्थच बदलला*

मल झाला माल

गल झाली गाल

पल झाला पाल

चल ची बदलली चाल

 

मत झाले मात

नत झाली नात

पत मधून उगवली पात

रत होताच झाली रात

 

मन चा वाढला मान

धन चे झाले धान

तन ने घेतली तान

नन झाली नान 

 

तर बनले तार

मर बनले मार

हर झाला हार

गर झाला गार

 

सर चे झाले सार

पर ने केले पार

धर ची बदलली धार

खर बनली खार

 

भर चा झाला भार

नर ची झाली नार

सर चे झाले सार

चर चे झाले चार 

 

गड झाले गाड

पड झाले पाड

झड झाली झाड

लड बनली लाड

 

कडी बनली काडी

गडी बनले गाडी

सड बनली साडी

वड झाले वाडी

 

गज बदलून झाली गाज

सज वर चढला साज

भज झाले भाज 

मज ला चढला भलता माज

 

रग ला आला राग

मग ने काढला माग

नग बनला नाग

जग ला आली जाग

 

भंग ने पाडला भांग

रंग ने लावली रांग

संग वदला सांग

ढंग ची झाली ढांग 

 

तप करता आला ताप

जप जपता झाला जाप

कपा ने केले काप

खप बनला खाप 

 

टळ चे झाले टाळ

मळ ची झाली माळ

चळ चे झाले चाळ

गळ ने काढला गाळ

 

अशी माय मराठीची संपन्नता

उभी रेघ अवतरता

अकार आकार होता

शब्दांच्या अर्थात येते परिवर्तनता.

आपल्याला आपल्या भाषेचा अभिमान वाटतो पण तो का? कारण एवढी वैज्ञानिकता इतर कुठल्या ही भाषेत नसेल.

म्हणून आपली भाषा अभिमानाने बोलू या.

मराठी भाषा गौरव दिनाच्या शुभेच्छा!

 

©  सुश्री विभावरी कुलकर्णी

सांगवी, पुणे

मोबाईल नंबर – ८०८७८१०१९७

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “ही लढाई अनिवार्य!” भाग – १ ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य 

☆ “ही लढाई अनिवार्य!” भाग – १ ☆ श्री संभाजी बबन गायके

कॅप्टन राकेश वालिया 

साडेनऊ वगैरे वय असताना या पोराचे आई-वडील रस्ते अपघातात जातात. हे पोर मग नातेवाईकाच्या आश्रयाला जातं. आई-बाप नावाची सावली सरल्यावर डोईवर ऊन-पावसाचा खेळ नित्याचा होतो. परिस्थिती याला बाल-कामगार बनवते. पोरगं कारखान्यात तुटपुंज्या रोजंदारीवर राबत राबत मोठं होत राहतं. इतरांच्या सायकली दुरुस्ती करत करत आपल्या आयुष्याचा मार्ग आक्रमत राहतं. कृश शरीरयष्टी त्यात अन्नाची आबाळ. खाली धरती आणि उशाशी आभाळ.

डिसेंबर, १९७१. भारतीय सैन्य पाकिस्तानशी लढायला निघालं आहे. दिल्ली रेल्वे स्टेशनवर सीमेवर निघालेली ट्रेन भरगच्च भरून तयार आहे. सैनिकांना जेवण पुरवण्यासाठी नेमलेला ठेकेदार त्याच्याकडच्या पोरांना घेऊन स्टेशनवर पोहोचला आहे. पोरं पटापटा प्रत्येक डब्यात आलू-पुरीचे डबे सैनिकांच्या हाती सोपवत आहेत. या पोरांची सुद्धा ही जगण्याची लढाईच की. हा लहानगा गडी सुद्धा त्याच लगबगीत आहे. गाडी हलली… हळूहळू पुढे जाऊ लागली. डब्याच्या खिडकीतून पाण्याची एक खास लष्करी बाटली डोकावली… पानी… पानी चाहिदा! कुण्या सैनिकाला पाणी भरून पाहिजे होतं. या पोराने ती हाक ऐकली… खिडकीपाशी धाव घेतली… फलाटावर ठेवलेल्या पाण्याच्या पिंपातलं पाणी बाटलीत शिगोशीग भरलं… आणि वेग घेत असलेल्या गाडीपेक्षा जास्त वेग धारण करीत त्या सैनिकाच्या हाती ती बाटली दिली!

“बेटे, फौज में भर्ती हो जाना… ” पोराच्या खांद्यावर थोपटत तो सैनिक म्हणाला… आणि गाडी पुढे निघून गेली… या पोराच्या डोक्यात एक विचार रुजवून.

त्या सैनिकाच्या डोईवर त्याने परिधान केलेल्या मोठ्या तिरकस, रुबाबदार टोपीने त्याच्या मनात घर केले. असा गणवेश पाहिजे आयुष्यात! नंतर समजले… पाणी मागणारी व्यक्ती सामान्य जवान नव्हते… अधिकारी होते त्यांच्यातले. काय लागतं सैनिक अधिकारी व्हायला? किमान माध्यमिक शिक्षण तर पाहिजेच. तोवर आठवीपर्यंत मजल गेली होती… शाळेत जाता कधी न जाताही. दहावीची परीक्षा दिली… उत्तीर्ण होणे अनिवार्य ठरले होते… Passed शेरा प्रमाणपत्रावर उमटलेला पाहून मन भारावून गेलं. सेनेत जाण्याचा मार्ग माहीत नव्हता तोवर. ग्वालियर येथे कारपेट कारखान्यात काम मिळाले. त्याच शहरात सेनेची भरती निघाली.

तोवर पोरानं धावण्याचा सराव, व्यायाम करून ठेवला होताच. प्राथमिक शारीरिक परीक्षेत निवड झाली… आता लष्करी वर्दी दूर नव्हती. पण समजलं की या भरतीमध्ये ती तिरकी टोपी नाही मिळणार घालायला… मन खट्टू झालं. डोक्यावर गोरखा बटालियनची, पूर्ण डोकं झाकणारी, हनुवटीवर घट्ट दोरी बांधलेली टोपी घालून एक भरती अधिकारी झाडाच्या सावलीत खुर्चीवर बसलेले दिसले. “त्यांच्यासारखी टोपी पाहिजे! ” हा तरुण म्हणाला. उत्तर मिळालं… ”त्यासाठी वेगळी परीक्षा असते.. आधी पदवीधर व्हावे लागते! ” पोराने मनाशी काही विचार केला… आणि त्या रांगेतून काढता पाय घेतला!

पडत-धडपडत बी. ए. ची पदवी पदरात पडली… पण नशिबाने पुढे मुंबईला पोहोचवलं… तारुण्यसुलभ मनाला सिनेमा नावाची जादूसुद्धा भावली होतीच तोवर. मायानगरीत एका फुटकळ प्रवासी एजन्सीत काम लागलं. कामानिमित्त कुलाब्याच्या नेव्ही नगरमध्ये मित्रासोबत जाणं व्हायचं… तिथे पांढ-या शुभ्र, रुबाबदार गणवेशात येणारे-जाणारे अधिकारी दिसायचे. त्यांपैकी एका साहेबांच्या दृष्टीस प्रवेशद्वाराजवळ नेहमी दिसणारा हा तरुण पडला. त्यांनी याची चौकशी केली आणि “माझ्यासारखे अधिकारी व्हायचं असेल तर स्पर्धा आहे… परीक्षा द्यावी लागेल” हे सांगून मार्ग सांगितला. त्या मार्गावर चालत हे महाशय ती परीक्षा देते झाले. एक-दोनदा आपटी खाल्ल्यानंतर एकदा उत्तीर्ण झाले. इतर कुणाचेही मार्गदर्शन नसल्याने ब-याच गोष्टी ठाऊकच नव्हत्या. वाटलं आता मिळेल युनिफॉर्म. मग समजलं आता एस. एस. बी. मुलाखत द्यावी लागेल… त्यातून सुटला की मग मिळेल वर्दी! मुलाखतीत अपयश आलं आणि या माणसाने रेल्वे रूळाकडे धाव घेतली. जीवन संपवून टाकलेले बरं. रेल्वे गाडी काही फुटांवर आल्यावर मनातला लढवय्या जागा झाला… कुणीतरी आपली परीक्षा घेतं आहे… ज्या अर्थी संकटे मोठी त्या अर्थी इनामही मोठेच असणार! गडी चपळाईने बाजूला झाला… मोठा आवाज करीत, धुरळा उधळीत ट्रेन निघून गेली… इथेही आणखी एक प्रयत्न करावा लागला. पण अलाहाबादमध्ये हेही दिव्य पार झालं. पण पुढे वैद्यकीय चाचणी असते… त्यात नापास म्हणजे थेट घरी परत जाणे. आयुष्यात तोवर कधी डॉक्टरांकडे जाण्याचा प्रसंग अनुभवला नव्हता. त्यावेळी पैसेच नसायचे. कामाच्या धावपळीत किरकोळ आजार दुर्लक्षित रहायचे. पायांत चप्पल नसायची बहुतेकवेळा. कधी काही जखम झाली की औषधी मलम म्हणून चक्क टूथपेस्ट लावायची जखमेवर… आग व्हायची… पण हेच औषध… जखम यथावकाश बरी व्हायची.

 वैद्यकीय तपासणीत सारं काही आलबेल… पण दृष्टी थोडी दोषपूर्ण. पण ते चालून गेलं त्यावेळी नशिबानं. अजूनही वर्दी मिळायला अवकाश होता. दिल्लीतून निजामुद्दीन स्टेशनवरून त्यावेळच्या मद्रास म्हणजे आताच्या चेन्नईकडे स्वारी निघाली. तमिल, मद्रासी भाषा येत नाही… स्टेशनचं नाव समजत नाही पटकन… चोवीस तास सलग प्रवास करून प्रशिक्षण संस्था गाठली. तिथं दैनंदिन वापरासाठीच्या वस्तूंचे कीट विकत घ्यावं लागतं हे ठाऊक नव्हतं. किंमत होती चौदाशे. खिशात सातशे. दोनदा रांगेतून बाहेर पडले साहेब. तिथल्या एका अनुभवी माणसाने हे ओळखले… सातशे रुपये उसने दिले.

प्रशिक्षण जड जाऊ लागले… घरी जावे आता… विचार आला. कारण प्रकृती धडधाकट नव्हती. खाण्याची आबाळ झालेली आयुष्यात. पण अशाच एका माणसाने धीर दिला… ही संधी पुन्हा मिळणार नाही! मनातला सैनिक आता पुन्हा उठून उभा ठाकला… प्रशिक्षण संपले! गुरखा पलटण हट्टाने मागून घेतली… आणि नशिबाने तीच मिळालीही… तीच तिरकी टोपी… हनुवटीवर बंद् घट्ट बांधलेली!

साडेनऊ वर्षे सेवा झाली… उत्तम सेवा झाली. ३५० ब्रिगेड मध्ये सारं काही उत्तम सुरु होतं. लग्न झालं. मुलगा झाला. आणि पत्नीला असाध्य व्याधीने घेरलं. कुटुंब फार मोठं नव्हतं. गरजेच्या वेळी पाठ फिरवलेल्या नातेवाईकांशी पुन्हा धागे जोडलेले नव्हतेच. कौटुंबिक परिस्थिती अगदीच हाताबाहेर जाऊ लागल्यावर स्वेच्छानिवृत्ती मागावी लागली. वैद्यकीय कारण म्हणून अनुग्रहाच्या तत्वावर सेवेतून निवृत्ती मिळाली. फारशी रक्कम हाताशी नव्हती. स्वत:चे घरही झालेले नव्हते. मुलगा अजून हाताशी यायचा होता. एक मारुती गाडी चालवायला घेतली. पुढे प्रवासी व्यवसायात उडी घेतली. पुढे नागरी विमान वाहतूक क्षेत्रात संधी मिळवली… आणि यश मिळायला आरंभ झाला.

– क्रमशः भाग पहिला 

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ मनाचे श्लोक – एक सार्वकालिक ‘मनोपनिषद’… – श्लोक ५ आणि ६ ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्री विश्वास देशपांडे

? इंद्रधनुष्य ?

☆ मनाचे श्लोक – एक सार्वकालिक ‘मनोपनिषद’… – श्लोक ५ आणि ६ ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

– – – श्लोक ५

मना पापसंकल्प सोडून द्यावा

मना सत्यसंकल्प जीवी धरावा |

मना कल्पना ते नको विषयांची |

विकारी घडे हो जनी सर्व ची ची ||

अर्थ : समर्थ मनाला बजावत आहेत की हे मना तू पापसंकल्प (वाईट विचार)सोडून दे आणि त्या जागी सत्यसंकल्पांना (सद्विचार किंवा परमात्मास्वरूपाचे ज्ञान) स्थान दे. हे मना तू विषयांची कल्पना देखील करू नकोस कारण विषयातून नाना प्रकारचे विकार निर्माण होतात. आणि मग तशा प्रकारची कृत्ये हातून घडतात. त्यामुळे लोकांमध्ये छी थू होते.

आधीच्या श्लोकात समर्थ म्हणतात, ” मना अंतरी सार विचार राहो ” मग मनामध्ये हे सार विचार म्हणजेच चांगले विचार कायमस्वरूपी राहावेत म्हणून काय करायला हवे ते समर्थ आपल्याला या श्लोकात सांगतात. त्यासाठी सुरुवातीला पापसंकल्प म्हणजे आपल्या मनातील वाईट विचारांचा त्याग करावा लागेल. प्रत्येकाच्या मनात चांगले वाईट असे विचार येतच असतात. त्यातही वाईट विचार लवकर येतात आणि ते नैसर्गिक असते. मग असे विचार घालवले तर त्या जागी दुसरे काहीतरी हवे कारण रिकामे मन हे सैतानाचे घर असते असे आपण म्हणतो. म्हणून समर्थ म्हणतात की पापसंकल्प म्हणजे वाईट विचारांचा त्याग केल्यानंतर मनामध्ये सत्यसंकल्पांना म्हणजे चांगल्या विचारांना स्थान द्यावे. आपले मन म्हणजे सुपीक जमीन अशी कल्पना केली तर त्यामध्ये जशा विचारांचे बीज आपण पेरू तसे ते उगवतील, अनेक पटींनी उगवतील. म्हणूनच त्यात सद्विचारांची पेरणी करावी आणि वाईट विचारांचे तण उपटून टाकावे.

पापसंकल्प आणि सत्यसंकल्प या दोन्ही शब्दात ‘ संकल्प ‘हा शब्द अतिशय महत्त्वाचा आहे. संकल्प म्हणजे आपल्याला पुढे जे काही करायचे आहे त्याचा विचार आणि उच्चार मनाशी करणे होय. जेव्हा आपण एखादे धार्मिक कार्य करतो तेव्हा सुरुवातीला गुरुजी आपल्या हातून त्याचा संकल्प सोडतात. म्हणजेच ते कार्य निर्विघ्नपणे पार पडावे आणि त्याचे परिणामस्वरूप फळ आपल्याला मिळावे असा त्यामागील हेतू असतो. नवीन वर्षात किंवा आपल्या वाढदिवसाच्या दिवशी देखील आपण संकल्प करत असतो. विद्यार्थी अभ्यासाचा, उत्तम शरीर प्रकृती कमावण्याचा निश्चय करतात. हे संकल्प साधारणपणे चांगलेच असतात. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचा संकल्प सोडला होता आणि मग तशी कृती त्यांच्या हातून घडली आणि त्यांच्या संकल्पास मूर्त रूप आले. आधी मनात विचार येतो, त्याप्रमाणे आपल्या जिभेवर ते शब्द येतात आणि नंतर त्याप्रमाणे कृती घडते. म्हणजे विचार, उच्चार आणि आचार ही संकल्पमागील त्रिसूत्री आहे असे म्हणता येईल. मग लौकिक व्यवहारात जर संकल्प एवढा आवश्यक आणि महत्वाचा असेल तर मग अध्यात्मात तर हवाच हवा.

पण असे संकल्प करण्यासाठी मनाचा निर्धार लागतो. त्यासाठी वाईट विचारांचा, कुबुद्धीचा त्याग करावा लागतो आणि त्या जागी सद्विचारांना जाणीवपूर्वक स्थान द्यावे लागते. हे करणे सोपे नाही. त्यासाठी  मनावर नियंत्रण ठेवण्याची सवय लावावी लागते. माणसाचे मन हे नेहमी विषयांकडे ओढ घेते. मनाचे विषय, बुद्धीचे विषय आणि इंद्रियांचे विषय माणसाला आकर्षित करत असतात. इथे विषय या शब्दाचा अर्थ वासना (इच्छा)असा घेता येईल. निरनिराळ्या प्रकारच्या वासना आपल्याला आकर्षित करून त्यांच्याकडे ओढत असतात. आपण त्या वासनांना बळी पडतो. म्हणजे आधी विचार येतो, मग आपल्या मुखात तशा गोष्टी येतात आणि नंतर तशी कृती घडते. तसे होऊ नये म्हणून समर्थ आधीच बजावतात की विषयांची कल्पनाच करू नये. एकदा का विषयांची कल्पना म्हणजे त्या विषयांना मनामध्ये स्थान दिले तर त्यांना बळ मिळत जाते आणि मग माणसाची कृती त्याप्रमाणे होते. काम, क्रोध, लोभ, मोह इ. षडविकार आहेत. माणूस विषयाधीन झाला किंवा वासना आणि विकारांना बळी पडला तर समाजामध्ये त्याची छी थू होते, तो माणूस म्हणवून घेण्याच्या लायकीचा राहत नाही.

श्रीरामांनी जीवनात संयमाला स्थान दिले आणि मर्यादांचे पालन केले म्हणूनच ते मर्यादा पुरुषोत्तम आहेत. रावण विद्वान होता, शूर होता, ज्ञानी होता पण तो विकारांना बळी पडला आणि त्यामुळे त्याचे अध:पतन झाले. आपण संयमाची मूर्ती असलेल्या आणि मर्यादापुरुषोत्तम असलेल्या श्रीरामांचे पूजन करतो, रावणाचे नाही. म्हणूनच विषयांची कल्पना देखील नको असे समर्थ म्हणतात.

आपल्यासारख्या सामान्य आणि संसारी माणसाच्या मनात साहजिकच प्रश्न येईल की मग विषय भोगायचेच नाहीत का? जीवनाचा आनंद घ्यायचा नाही का? अशा प्रसंगी श्रीरामांचा आदर्श आपल्या डोळ्यासमोर ठेवावा. श्रीरामांनी जीवनाचा आनंद घेतला परंतु त्यासाठी धर्माने जी मर्यादा आखून दिली आहे, तिचे त्यांनी पालन केले. म्हणून आपल्या धर्मात, संस्कृतीत जे मान्य असेल त्याचा संयमितपणे उपभोग आपण घेऊ शकतो. आणि ते करत असताना सत्यसंकल्पाकडे म्हणजे परमेश्वराच्या प्राप्तीकडे आपली वाटचाल करू शकतो. हल्ली जग जवळ आले आहे. द वर्ल्ड इज अ ग्लोबल व्हिलेज असं आपण म्हणतो. पण प्रत्येक देशाच्या चालीरीती, संस्कृती निराळी असते. ते पाहिल्यानंतर आपल्याकडील नीतिमत्तेच्या कल्पना आपल्याला चुकीच्या वाटू शकतात. परंतु जिथे जसे वागणे योग्य असते तसेच वागायला हवे. इतर ठिकाणी अमुक अमुक गोष्ट मान्य आहे म्हणून आपण इकडेही तसं करायला काय हरकत आहे असा सोयीस्कर विचार आपल्या मनात येऊ शकतो. कारण मनाची धाव विषयांकडेच असते. पण ती गोष्ट आपल्या धर्मात, संस्कृतीत किंवा नीतिमत्तेच्या कल्पनेत बसते का याचा विचार करायला हवा. असतो मा सद्गमय, तमसो मा ज्योतिर्गमय अशी आपली वाटचाल जीवनामध्ये असले पाहिजे. हेच या ठिकाणी समर्थांना सांगायचे आहे.

संकल्प जसा असेल, तसे जीवन घडते. म्हणून समर्थ प्रथम मनाला शुद्ध करण्याचा आग्रह धरतात. मन शुद्ध झाले की मार्ग आपोआप प्रकाशमान होतो; सत्यसंकल्पातूनच श्रेयसाचा प्रवास सुरू होतो.

स्वसंवाद..

  • माझ्या मनात वारंवार येणारे विचार कोणत्या प्रकारचे असतात?
  • मी जाणीवपूर्वक सत्यसंकल्प करून तो पाळण्याचा प्रयत्न करतो का?
  • माझे विचार, शब्द आणि कृती यांमध्ये सुसंगती आहे का?
  • विषयांच्या आकर्षणामुळे मी कधी माझ्या मूल्यांशी तडजोड करतो का?
  • माझ्या जीवनसंकल्पाची दिशा केवळ यशाकडे आहे की मानसिक आणि अध्यात्मिक उन्नतीकडेही?

– – – 

– – – श्लोक ६.

नको रे मना क्रोध हा खेदकारी |

नको रे मना काम नाना विकारी |

नको रे मदा सर्वदा अंगीकारू |

नको रे मना मत्सरू दंभ भारू ||||

अर्थ : हे मना, क्रोधाला स्थान देऊ नकोस; तो शेवटी खेद आणि दुःख देणाराच आहे. कामवासना नाना प्रकारचे विकार निर्माण करते. मद (अहंकार), मत्सर आणि दंभ (ढोंगीपणा) या विकारांपासून दूर राहा असा समर्थांचा स्पष्ट उपदेश आहे.

मागील श्लोकात समर्थांनी “पापसंकल्प” सोडण्याची सूचना केली. येथे ते त्या पापसंकल्पांचे मूळ असलेल्या विकारांकडे आपले लक्ष वेधतात. मनाच्या अध:पतनाला कारणीभूत ठरणारे हे विकार म्हणजेच षडरिपूंपैकी प्रमुख काम, क्रोध, मद, मत्सर आणि दंभ. त्याबद्दल समर्थ प्रामुख्याने या ठिकाणी सांगतात.

क्रोध हा खरोखरच खेदकारी आहे. रागाच्या भरात उच्चारलेले शब्द आणि केलेली कृती अनेकदा नंतर पश्चातापाला कारणीभूत ठरतात. हातातून सुटलेला बाण जसा परत येत नाही; तसेच रागाच्या भरात बोललेले शब्दही.

क्रोध हा क्षणिक असतो; पण त्याचे परिणाम मात्र दीर्घकाळ मनात जखम करतात. म्हणूनच मोठी माणसे आपल्याला सांगतात की राग आला की थोडा थांबा, एक ते दहा अंक मोजा, श्वास घ्या. कोणतीही प्रतिक्रिया देण्याआधी विचार करा. हा छोटासा विरामच अनेक अनर्थ टाळू शकतो.

कामभावना ही जीवनातील नैसर्गिक शक्ती आहे. ती नाकारण्याची गोष्ट नाही; पण तिचा अतिरेक विकारांना आमंत्रण देतो. काम म्हणजे केवळ लैंगिक वासना नव्हे; कोणत्याही गोष्टीचा अतिरेकी हव्यास हा देखील ‘काम’च.

विवाहमंत्रातील “धर्मेच अर्थेच कामेच नातिचरामि” हे वचन याच संतुलनाची शिकवण देते. धर्माच्या चौकटीत राहून अर्थ आणि कामाचा स्वीकार ही आपली संस्कृती आहे. संयमित काम सृजनशील असतो तर त्याचा अतिरेक विनाशकारी ठरतो.

संत परंपरेत तीन ‘एषणा’ सांगितल्या आहेत. वित्तेषणा (संपत्तीची हाव), दारेषणा (सुंदर स्त्रीची अभिलाषा) आणि लोकेषणा (कीर्तीचा हव्यास). या तिन्ही एषणा किंवा वासना मनाला बाहेर खेचतात. अध्यात्माची वाट मात्र अंतर्मुख करते. म्हणूनच ती श्रेयस्कर!

यश, वैभव किंवा कीर्ती मिळाली की मनात ‘मीच केले’ हा अहंकार उद्भवतो. ‘ वऱ्हाड निघालं लंडनला ‘ या लक्ष्मण देशपांडे यांच्या एकपात्री प्रयोगात एक नणंदेचं पात्र आहे. काही चांगलं झालं की ते माझ्यामुळे झाला असं ती सारखं म्हणत असते. हा फुकाचा अहंकार. हा मद म्हणजेच अहंकार साधकाच्या प्रगतीत अडथळा ठरतो.

इतरांची प्रगतीने सज्जनांना आनंद होतो. पण ज्यांना ती पाहवत नाही त्यांना मत्सर निर्माण होतो आणि मत्सरातून द्वेष जन्म घेतो. आणि मग स्वतःला श्रेष्ठ दाखवण्याचा दंभ सुरू होतो. हे असते आभासी मोठेपणाचे प्रदर्शन. जर मनापासून एखादी गोष्ट कोणी करत नसेल तर टिळे, टोपी, गंधमाळा, भगवे कपडे या सगळ्या गोष्टी म्हणजे सोंग आहेत. जो सगळ्या गोष्टी मनापासून करतो त्याला असे प्रदर्शन करण्याची गरज भासत नाही. पांढरे कपडे घालून समाजसेवेचा आव आणणे, वाङ्मयचौर्य करणे हा देखील असाच प्रकार म्हणता येईल.

‘जगाच्या पाठीवर ‘ या चित्रपटात ग दि माडगूळकर यांनी लिहिलेले एक सुंदर गाणे आहे ‘ थकले रे नंदलाला ‘ हे गीत आजच्या परिस्थितीचे अतिशय सुंदर वर्णन करते यातील प्रत्येक ओळ आजच्या राजकीय आणि सामाजिक वातावरणाला लागू पडते. या गीतातील ‘ निलाजरेपण कटीस नेसले, निसुगपणाचा शेला… ‘ यासारखी ओळ असो किंवा ‘ विषयवासना वाजे वीणा, अतृप्ती दे ताला… ‘ यासारखी ओळ असो त्या आजच्या परिस्थितीचे हुबेहूब वर्णन करतात.

हे विकार सूक्ष्म असतात; पण आत्मविकासाच्या वाटेवर ते खोल दरी निर्माण करतात. राघवाच्या अनंत मार्गावर चालायचे असेल तर बाह्य शत्रूंपेक्षा अंतर्गत शत्रूंवर विजय मिळवावा लागतो. हा मार्ग दुसऱ्यांवर विजय मिळवण्याचा नाही; तर स्वतःवर विजय मिळवण्याचा आहे. साधकाला देहबुद्धी ओलांडून आत्मबुद्धीकडे वाटचाल करायची असते. या प्रवासात विकारांवर सतत लक्ष ठेवावे लागते. कारण ते हळूहळू, नकळत मनावर कब्जा करतात.

त्यासाठी मनावर एकदम नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न न करता सुरुवात छोट्या छोट्या गोष्टींनी करावी. मोठ्या प्रतिज्ञेपेक्षा छोट्या, सातत्यपूर्ण संयमाचे पाऊल अधिक प्रभावी असते.

स्वसंवाद..

  • रागाच्या क्षणी मी थांबतो का, की तत्काळ प्रतिक्रिया देतो?
  • माझ्या इच्छांमध्ये संयम आहे का, की अतिरेक?
  • इतरांच्या यशाने मला आनंद होतो की मत्सर?
  • माझ्या यशामागे ईश्वरकृपा आणि इतरांचा देखील वाटा आहे याचे भान मी ठेवतो का?
  • बाह्य जग जिंकण्यापेक्षा मी स्वतःवर विजय मिळवण्याचा प्रयत्न करतो का?

– क्रमशः श्लोक ५ आणि ६.

© श्री विश्वास देशपांडे

चाळीसगाव

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “अर्थपूर्ण गिचमिड…” माहिती संग्राहक / लेखक : अज्ञात ☆ सौ शोभा जोशी ☆

सौ शोभा जोशी 

? इंद्रधनुष्य ?

☆ “अर्थपूर्ण गिचमिड…” माहिती संग्राहक / लेखक : अज्ञात ☆ सौ शोभा जोशी

पुण्याच्या प्रसिद्ध फर्ग्युसन कॉलेज रोडवर (FC Road) संध्याकाळची वेळ होती. तरुण मुला-मुलींची गर्दी, कॅफेमधला गोंगाट आणि वाहनांचा आवाज.

तिथेच, एका कोपऱ्यात, जिथे महापालिकेची मोठी कचराकुंडी होती, तिथे एक ६५-७० वर्षांचा म्हातारा बसला होता.

त्याचा अवतार बघण्यासारखा नव्हता. अंगावर एकच फाटका शर्ट, वाढलेली दाढी, जटा झालेले केस आणि अंगाला दुर्गंधी येत होती. तो कचऱ्यातून काहीतरी शोधून खात होता.

येणारे-जाणारे लोक त्याला बघून नाक मुरडत होते. काही टवाळखोर पोरं त्याला दगड मारून पळून जात होती. “ए वेड्या! ए सायंटिस्ट! काय शोधतोय कचऱ्यात? “

तो म्हातारा कोणाकडेच बघत नव्हता.

त्याच्या हातात एक ‘विटकरीचा तुकडा’ (Red Brick Piece) होता.

तो त्या तुकड्याने फुटपाथवर आणि समोरच्या भिंतीवर काहीतरी ‘गिचमिड’ लिहित होता.

लोक हसून म्हणायचे, “बघा, वेडा काहीतरी नक्षी काढतोय. “

त्याच वेळी, तिथून ‘समीर’ एका लग्सरी कार मधून जात होता. समीर आता शहराचा ‘जिल्हाधिकारी’ (Collector) झाला होता. त्याला आज कॉलेजच्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलावलं होतं.

समीरची नजर त्या म्हाताऱ्यावर पडली.

गाडी सिग्नलला थांबली होती. समीरने खिडकीतून बाहेर पाहिलं. त्या म्हाताऱ्याने भिंतीवर जे लिहिलं होतं, ते बघून समीरचे डोळे विस्फारले.

ते काही गिचमिड नव्हतं.

ती ‘कॅल्क्युलसची अवघड समीकरणं’ (Complex Calculus Integration Problems) होती.

आणि ती इतकी अचूक होती की, एखाद्या सामान्य प्रोफेसरलाही सोडवायला वेळ लागेल.

समीरने ड्रायव्हरला ओरडून सांगितलं, “गाडी थांबव! आताच्या आता! ” समीर गाडीतून उतरला. तो आपला सूट-बूट सावरत त्या कचराकुंडीजवळ गेला.

सुरक्षारक्षक आणि लोक बघत राहिले. “कलेक्टर साहेब या वेड्यापाशी का जात आहेत? “

समीर त्या म्हाताऱ्याच्या जवळ गेला. दुर्गंधी येत होती, पण समीरला त्याचं भान नव्हतं.

तो भिंतीवरची ती गणितं वाचत होता. आणि त्याला त्याच्या बालपणीची आठवण झाली.

त्याच्या शाळेत एक शिक्षक होते – ‘देशपांडे सर’. जे गणिताचे जादूगार होते. ते नेहमी म्हणायचे, “गणितात देव असतो रे! आणि हे जग एक समीकरण आहे. “

पण २० वर्षांपूर्वी, देशपांडे सरांच्या पत्नीचा आणि मुलाचा एका भीषण अपघातात मृत्यू झाला होता. त्या धक्क्याने सर वेडे झाले होते आणि ते कुठेतरी गायब झाले होते.

समीरने थरथरत्या हाताने त्या म्हाताऱ्याच्या खांद्यावर हात ठेवला.

“सर? देशपांडे सर? “

त्या म्हाताऱ्याने मान वर केली. त्याचे डोळे रिकामे होते. त्यात कोणतीच ओळख नव्हती.

तो फक्त हसला आणि म्हणाला, “बाळा, हे गणित चुकलंय बघ. इथे ‘X’ नाही, ‘Y’ पाहिजे. हे जग चुकलंय… “

त्या एका वाक्याने समीरला खात्री पटली. हा आवाज तोच होता.

समीरच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा लागल्या.

ज्या शिक्षकाने त्याला घडवलं, ज्याच्यामुळे आज तो ‘कलेक्टर’ झाला होता, तो गुरु आज कचऱ्यात अन्न शोधत होता आणि लोक त्याला दगड मारत होते.

समीर तिथेच, त्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यात गुडघ्यावर बसला.

त्याने त्या म्हाताऱ्याचे घाणेरडे, चिखलाने माखलेले पाय आपल्या हाताने धरले आणि त्यावर डोकं ठेवलं.

गर्दी जमली होती. लोक फोटो काढत होते.

समीर ओरडला, “ए फोटो काय काढताय? लाज वाटत नाही तुम्हाला?

ज्या माणसाला तुम्ही ‘वेडा’ समजून दगड मारलेत ना… ते तुमचे आणि माझे ‘बाप’ आहेत ज्ञानाने.

हे ‘प्राध्यापक विनायक देशपांडे’ आहेत. ज्यांनी हजारो इंजिनिअर्स आणि डॉक्टर्स घडवलेत.

आज नियतीने त्यांची परीक्षा घेतली, आणि तुम्ही समाजाने त्यांना नापास केलं. “

समीरने स्वतःचा कोट काढला आणि सरांच्या अंगावर घातला. त्याने जवळच्या हॉटेलमधून पाणी आणलं आणि स्वतःच्या हाताने सरांचा चेहरा धुतला.

देशपांडे सर शांत होते. ते फक्त समीरकडे बघत होते. कदाचित त्यांच्या स्मृतीच्या पडद्यावर काहीतरी अस्पष्ट आठवत असावं.

समीरने त्यांना आपल्या सरकारी गाडीत बसवलं.

तो त्यांना आपल्या घरी घेऊन गेला.

त्यांना आंघोळ घातली, नवीन कपडे दिले आणि पोटभर जेवण दिलं.

जेवताना देशपांडे सर अचानक थांबले.

त्यांनी समीरकडे बघितलं आणि विचारलं, “बाळा… ते इंटीग्रेशनचं गणित सुटलं का रे तुझं? “

समीर रडत हसला. “नाही सर… तुम्ही शिकवाल तरच सुटेल. “

समीरने पुढचे ५ वर्षे देशपांडे सरांचा सांभाळ केला.

औषधोपचाराने त्यांची स्मृती पूर्ण परत आली नाही, पण त्यांना हे समजलं की आपण सुरक्षित आहोत.

समीर रोज संध्याकाळी ऑफिसवरून आला की पाटी-पेन्सिल घेऊन सरांच्या समोर बसत असे.

आणि देशपांडे सर, ज्यांना स्वतःचं नाव आठवत नसे, ते मात्र समीरला गणिताची अवघड समीकरणं अगदी सफाईदारपणे शिकवत असत.

ज्या दिवशी देशपांडे सर वारले, त्या दिवशी समीरने त्यांच्या अंत्यविधीसाठी एकही दिवस सुट्टी घेतली नाही.

तो म्हणाला, “सरांची शिकवण होती – कर्म करत राहा. मी रडणार नाही, कारण त्यांनी मला गणितातल्या शून्यातून विश्व निर्माण करायला शिकवलंय. “

रस्त्यावरचा प्रत्येक वेडा किंवा भिकारी हा जन्मताच तसा नसतो. कोणाचं नशीब कधी फिरेल सांगता येत नाही. ज्या हातांनी आज तुम्ही दगड मारताय, त्या हातांनी कधीतरी कोणाचं भविष्य घडवलं असेल. शिक्षकांचा आणि बुजुर्गांचा आदर करा, परिस्थिती कशीही असो. कारण ज्ञान कधीच म्हातारं होत नसतं आणि ते कधीच कचरा होत नसतं.

माहिती संग्राहक / लेखक : अज्ञात 

प्रस्तुती :  सौ शोभा जोशी

कार्यकर्ती, जनजाती कल्याण आश्रम, पुणे महानगर. 

मो ९४२२३१९९६२ 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ।। श्री नारद उवाच ।। – नारद भक्ति सूत्रे —सूत्र ४७ ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ☆

श्री संदीप रामचंद्र सुंकले

? इंद्रधनुष्य ?

।। श्री नारद उवाच ।। – नारद भक्ति सूत्रे — सूत्र ४७ ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले 

।। श्री नारद उवाच ।। 

 नारद भक्ती सूत्र क्र. ४७ 

यो विविक्तस्थानं सेवते, यो लोकबन्धमुन्मूलयति, निस्त्रैगुण्यो भवति, योगक्षेमं त्यजति ॥ ४७ ॥

अर्थ : जो एकांतवासाचे सेवन करतो, लौकिक संबंधांमुळे निर्माण झालेली बन्धने तोडून टाकतो, जो तीन गुणांनी रहित होतो आणि जो योग व क्षेमाचाही त्याग करतो, तो माया तरून जातो.

विवेचन :  साधनाचा विचार करीत असता त्याचे अंतरग व बहिरंग असे प्रकार संभवतात हे पूर्वी सांगितलेच आहे. अंतरंगसाधनांना बहिरंग-साधनाची आवश्यकता असते. संगत्याग हे साधन मागील सूत्रात सांगितले आहे ते सिद्ध होण्याकरिता या सूत्रात ‘विविक्त स्थानं सेवते’ म्हणजे निर्जन एकांतवासाचा आश्रय करतो असे सांगितले आहे. याचा उल्लेख गीतेमध्ये आढळतो.

भगवंत म्हणतात,

“माझ्या ठायी अनन्यत्वें भक्ति निष्काम निश्चळ | एकांताविषयीं प्रीति जन संगात नावड||”

(गीताई १३. १०)

एकांत… समर्थ रामदास स्वामी म्हणतात,

“कांहीं गल्बला कांहीं निवळ । ऐसा कंठीत जावा काळ । जेणेंकरितां विश्रांती वेळ । आपणासी फावे ॥”

(दास. १९. ०८. २९)

अनेक लोकांना एकांत शब्द सोडून देऊ, एकटं राहण्याचीही भीती वाटते. या भीतीमागील एक कारण हे असू शकते की त्यांना आपण एकटेच आहोत या *भीती*ची भीती वाटतं असते. एकांत हा शब्दाबद्दल एक गैरसमज आहे. एकटे रहाणे म्हणजे एकांत. मनुष्य एकटा राहतो. दिसायला तो एकांतात दिसतो, पण स्वतःच्या मनात तो मनोराज्य रचत असतो. याला खरा एकांत म्हणता येत नाही आणि अशा एकांताचा त्या मनुष्याला काहीही लाभ होत नाही. उलट असे करून स्वतः च स्वतःची फसवणूक करून घेत असतो.

एकांताची समर्पक व्याख्या पुढील प्रमाणे करता येईल. “एकाचाही अंत म्हणजे एकांत. “

संत तुकाराम महाराजांच्या चरित्रात याचे वर्णन आहे. ते भंडाऱ्याच्या डोंगरावर जाऊन एकांताचा अनुभव घेत असतं. ते स्वतःला इतके विसरून जात की जंगलातील पक्षी एखादे झाड समजून त्यांच्या अंगावर खांद्यावर खेळत असतं, बागडत असतं. तेथील लता, वेली त्यांची सोयरी झाली होती.

“वृक्षवल्ली आम्हां सोयरी वनचरे । पक्षीही सुस्वरे आळविती ।।१।। तेणे सुखे रुचे एकांताचा वास । नाही गुणदोष अंगा येत ।।२।।”

साधकाने कोणतेही साधन करावा, चिंतन करावे, ध्यान, भजन असो, मन एकाग्र झाल्या शिवाय त्यात गती प्राप्त होत नाही. अनादिकालीन संस्कारामुळे साधकाचे मन चंचल असते हे प्रसिद्ध आहे. त्याला निश्चळ बनवण्याकरिता काही साधने करावी लागतात.

साधकाच्या चित्तक्षोभाची बाह्य कारणेही दूर होणे आवश्यक आहे. ती विघ्ने म्हणजे स्वजन-परजनांकडून होणारा संसर्ग. तो अनेक प्रकारचा असू शकतो. तो गावातल्या त्या गजबजाटात राहून दूर करता येत नाही, सर्वावर नियंत्रण कसे ठेवता येईल? याकरिता तो संसर्ग टाळणेच अवश्य आहे. या दृष्टीने विविक्त स्थान म्हणजे एकांतवासाचा आश्रय त्या साधकाला घ्यावा लागतो.

संत तुकाराम महाराज म्हणतात,

“संगें वाढे सीण न घडे भजन । त्रिविध हें जन बहु देवा ॥१॥ याचि दुःखें या जनाचा कांटाळा । दिसताती डोळां नानाछंद ॥२॥ एकविध भाव राहावया ठाव । नेदी हा संदेह राहों चित्तीं ॥३॥शब्दज्ञानी हित नेणती आपुलें । आणीक देखिलें नावडे त्या ॥४॥ तुका म्हणे आतां एकलें चि भलें । बैसोनि उगलें राहावें तें ॥५॥”

(अभंग क्रमांक ३१९५, सार्थ तुकाराम गाथा, धार्मिक प्रकाशन संस्था)

सूत्राच्या पुढील भागात या लोकबन्धमुन्मूलयति असे नारद म्हणतात.

श्रीसद्गुरू गोंदवलेकर महाराज म्हणायचे की परमार्थाला आपल्या घरापासून सुरुवात करावी. मंदिरातील मूर्तीत राम आहे आणि माझ्या घरातील माणसांमध्ये तो नाही असे कसे होऊ शकेल? पुत्रेषणा, दारेषणा, वित्तेषणा यापेक्षाही साधक-भक्ताला लोकेषणा बाधक असते. लोकानी स्तुती करावयास आरंभ केला की तीच प्रिय वाटावयास लागते. पण स्तुतीबरोबर हळूहळू निंदाही होण्याला सुरुवात होते, ज्याला स्तुतीने सुख वाटते त्याला निंदा ऐकून दुःख झाल्याशिवाय राहत नाही. हाच लोकबन्ध होय. श्री जगन्नाथ कुंटे यांच्या एका पुस्तकात उल्लेख आहे. निंदा गोड वाटू लागली म्हणजे साधक पक्का झाला. जोपर्यंत साधकाला स्तुती गोड वाटते, तोपर्यंत तो भगवंतापासून खूप दूर आहे असे समजायला हरकत नाही.

पतितपावना देवराया ॥१॥

संसार करितां म्हणती हा दोषी ।

टाकितां आळसी पोटपोसा ॥ध्रु. ॥

आचार करितां म्हणती हा पसारा ।

न करितां नरा निंदिताती ॥२॥

*

संतसंग करितां म्हणती हा उपदेशी ।

येरा अभाग्यासि ज्ञान नाहीं ॥३॥

*

धन नाहीं त्यासि ठायींचा करंटा ।

समर्थासि ताठा करिताती ॥४॥

*

बहु बोलों जातां म्हणति हा वाचाळ ।

न बोलतां सकळ म्हणती गर्वी ॥५॥

*

भेटिसि नवजातां म्हणती हा निष्ठुर ।

येतां जातां घर बुडविलें ॥६॥

*

लग्न करूं जातां म्हणती हा मातला ।

न करितां जाला नपुंसक ॥७॥

*

निपुत्रिका म्हणती पहा हो चांडाळ ।

पातकाचें मूळ पोरवडा ॥८॥

*

लोक जैसा लोक धरितां धरवे ना ।

अभक्ता जिरे ना संतसंग ॥९॥

*

तुका म्हणे आतां ऐकावें वचन ।

त्यजुनियां जन भक्ति करा ॥१०॥

संत तुकाराम महाराज शेवटच्या चरणात सर्वाना सांगतात की, जनाचा त्याग करून त्यांचा संसर्ग स्वकीय, परकीय, शिष्य, भक्त म्हणविणारे असोत का विरोधी असोत टाळून भक्ती करा.

निस्त्रैगुण्यो भवति’

“प्रकृतीपासुनी होती गुण सत्त्व_रजस_तम|

ते निर्विकार आत्म्यास जणू देहांत जुंपिती||”

(गीताई १४. ०५)

सत्त्वगुण सुखसंग व ज्ञानसंगाच्याद्वारा बांधतो, रजोगुण हा आसक्ती काम याच्या द्वारे बांधतो. तमोगुण पूर्ण अज्ञान, मोह, प्रमाद, आलस्य, निद्रा इत्यादिकांच्या द्वारे जीवास बांधतो. जसा मासा हा आमिषाच्या आशेने स्वतःच्या प्राणघातक अशा गळाला अडकतो तसाच क्षेत्रज्ञ जीव या गुणाच्या जाळ्यात अडकतो. गुण म्हणजेच सर्व संसार आहे. कारण सचेतन-अचेतन सर्व सृष्टीही गुणात्मकचआहे, असेच श्रीकृष्णांनी अर्जुनास सांगितले आहे. भक्ताला गुणातीत बनावयाचे असते. त्याला तीन गुणांहून अतीत अशा निर्गुण भक्तियोगाचा आश्रय करावयाचा असतो. तसेच त्रिगुण आले की ते आपला एक प्रकारचा अहंकारही घेऊन येतात. तोही भक्तिमार्गाला प्रतिबंधक आहे म्हणून नारद ‘निस्त्रैगुण्यो भवति’ असे म्हणतात.

योग क्षेम त्यजति

संसारामध्ये बहुतेक जीवाना आपल्या निर्वाहाची चिंता लागलेली असते. जीवनावश्यक पदार्थ अनेक असतात, ते मिळतील का व प्राप्त झालेले टिकतील का ही जीवनाची एक महान समस्या आहे. अप्राप्त वस्तूची प्राप्ती व्हावी व प्राप्त आणि अनुकूल वस्तूचा नाश न व्हावा, त्या आपल्या म्हणून आपणाजवळ अखंड राहाव्या या भावनेला योगक्षेम म्हणतात. अप्राप्ताची प्राप्ती म्हणजे योग व प्राप्ताचे रक्षण हा क्षेम असा योगक्षेम शब्दाचा सामान्य अर्थ आहे. या योग-क्षेमाच्याच विवंचनेत बहुतेक माणसे गढून गेलेली आहेत. तसेच अप्राप्त पदार्थाच्या प्राप्तीला काही मर्यादा घालता येत नाहीत, व ते प्राप्त होण्याकरिता सतत प्रयत्नशील राहावे लागते. नाना प्रकारची शुभाशुभ कर्मे करीत रहावे लागते आणि प्राप्ताच्या संरक्षणाकरिताही थोडे श्रम करावे लागत नाहीत. एखादा साधकदेखील या योग-क्षेमाच्या चिंतेने ग्रस्त होणे शक्य आहे. पण ज्याला मायेतून तरून जावयाचे आहे त्या साधकाने आपल्या देहभरण – पोषणाची म्हणजेच लौकिक योग-क्षेमाची चिंता ठेवू नये. कारण देहाचे भरण – पोषण झाले तरी तेवढ्याने सर्व पुरुषार्थप्राप्ती झाली असे नाही. त्या भरण-पोषणातूनही पुन्हा अनेक विकार निर्माण होऊन ते जीवन अशांत बनवीत असतात.

भगवतांचे वचन आहे.

“अनन्य भावें चिंतूनि भजती भक्त जे मज| सदा मिसळले त्यांचा मी योग क्षेम चालवी||”

(गीताई ०९. २२)

मनुष्याला मिळणाऱ्या भौतिक गोष्टी प्रारब्धाने मिळत असतात. सर्वसंगपरित्याग केलेल्या साधकाची भूक आपसूक कमी होते. ज्याने जीभ जिंकली, त्याने अर्धा परमार्थ जिंकला असे म्हणतात.

– – संत तुकाराम महाराजांचा पुढील अभंग पुरेसा बोलका आहे.

साळंकृत कन्यादान ।

पृथ्वी दानाच्या समान ॥१॥

परि तें न कळे या मूढा ।

येईल कळों भोग पुढां ॥ध्रु. ॥

आचरतां कर्म ।

भरे पोट राहे धर्म ॥२॥

सत्या देव साहे ।

ऐसें करूनियां पाहें ॥३॥

अन्न मान धन ।

हें तों प्रारब्धा आधीन ॥४॥

तुका म्हणे सोसे ।

दुःख आतां पुढें नासे ॥५॥

पुढील सूत्रात आपण आणखी दोन गोष्टींचा कसा त्याग करायचा हे पाहणार आहोत. जय जय रघुवीर समर्थ

नारद महाराज की जय!!!

– भक्ती सूत्र क्र. ४७.

© श्री संदीप रामचंद्र सुंकले (दास चैतन्य)

थळ, अलिबाग. 

८३८००१९६७६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “Not today! Not today!” ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य 

☆ “Not today! Not today!” ☆ श्री संभाजी बबन गायके

Not today! Not today! Not today!.. आज मी मरणार नाही.. कुटुंबाला मरू देणार नाही!

… अगदी मागच्याच आठवड्यात त्याला केवळ साडेतीनशे मीटर्स अंतर पोहताना खूप दम लागला होता… त्यासाठी त्याने त्याच्या जलतरण प्रशिक्षकाची बोलणीही खाल्ली होती. आणि आज तर त्याच्यापासून किनारा सुमारे चार किलोमीटर्स दूर होता… आणि त्या समुद्रातल्या लाटा त्याला पुढे जाऊ देत नव्हत्या! पण त्याला तर किना-यावर पोहोचायचंच होतं… आज तो मृत्यूला शरण जाणार नव्हता… आणि त्याची आई आणि त्याचे दोन भावंडं अशा तिघांनाही मरणाच्या दारात सोडून येणार नव्हता!

ऑस्ट्रेलियामधील पर्थ शहराच्या दक्षिणेला २०० किलोमीटर्सवर असलेल्या क्विन्डालप या समुद्रकिना-यावर जिओग्राफी बे याठिकाणी केवळ तेरा वर्षे वयाच्या ऑस्टिनचे कुटुंब सुट्टीसाठी आलेले होते… आई जोन, त्याची आठ वर्षांची धाकटी बहिण आणि अकरा वर्षांचा धाकटा भाऊ असे तिघे होते. सुट्टीच शुक्रवार हा शेवटचा दिवस होता. परत जाण्याची तयारी झालीच होती… पण हाताशी आणखी थोडावेळ असल्याने त्यांनी समुद्रात फेरफटका मारण्यासाठी एक Paddle Board भाड्याने घेतला… हे रबरी बोर्ड्स हवा भरून फुगवले जातात… आणि हा बोर्ड वल्हे मारून चालवावा लागतो. या board वर ऑस्टिनची आई आणि त्याची दोन्ही भावंडं स्वार झाली… तर ऑस्टिनने स्वत:साठी कयाक बोट घेतली होती… निमुळती असलेली ही छोटीशी बोट वल्ह्याने वल्व्हावी लागते. या समुद्रसफरीला एक तासभर लागणार होता. ऑस्ट्रेलियन माणसं तशी दर्यावर्दी. खोल समुद्रात ते अत्यंत सहजतेने विहार करतात. पोहण्याचे शिक्षण हा त्यांच्याकडे शालेय शिक्षणाचा भाग आहे. समुद्रात बुडणा-या लोकांना वाचवण्यासाठी त्यांच्या समुद्र किना-यांवर विशेष जीवरक्षक तैनात असतात… हे आपण टी. व्ही. वरील बॉन्डाय रेस्क्यू कार्यक्रमात पाहिले असेलच.

 ऑस्टिन छान कयाकिंग करीत होता… पण उत्साहाच्या भरात तो समुद्रात काहीसा जास्त पुढे जाऊ लागला… तसे त्याच्या आईने त्याला मागे बोलवण्यासाठी Paddle Board त्याच्या जवळ नेला. या प्रयत्नात तिचा Paddle Board पाण्यात पलटला आणि तिच्या हातातला एक वल्हे पाण्यात पडले आणि दूर वाहून गेले. आता सर्वजण पाण्यात होते… जोन ने कसाबसा तो paddle board सरळ केला आणि त्यावर तिघेही चढले… जोन Paddle Board एका वल्ह्याने वल्हवू लागली… पण तितक्यात समुद्रात जोराचा वारा सुटला, लाटा उफाणल्या आणि paddle board आणि कयाक यांना आत आत खेचू लागल्या…! आणि paddle board पुन्हा पलटी झाला… जोनच्या हातातलं दुसरं वल्हे सुद्धा पाण्यात पडले! ऑस्टिन त्याची कयाक घेऊन यांना वाचवण्यासाठी पुढे सरसावला… त्या तिघांना त्याने कयाकमध्ये ओढून घेतले… पण आता कयाक जड झाली… तिच्यात पाणी भरू लागले… मग या सर्वांनी पाण्यात उद्या घेतल्या… कयाक मधले पाणी समुदात खाली केले… आणि कयाक सरळ करीत पुन्हा तिच्यात चढले… पण आता लाटा आणखी जोरदार येऊ लागल्या… कयाक टिकेल असे वाटत नव्हते. पण तरीही कुणी फार घाबरले नव्हते! किनारा काही फार दूर नव्हता. शिवाय paddle board आणि कयाक ज्या हॉटेलने भाड्याने दिले होते… ते लोक… यांना उशीर झाला म्हणून यांना शोधायला येतीलच… असं जोन ला वाटलं! पण तसं काही घडलं नाही. चार तास उलटून गेले होते या संघर्षाला…

 किना-यावर जवळपास कुणी नव्हतेच… आणि पुढे येणारी प्रत्येक लाट त्यांच्यातले आणि किना-यातले अंतर वाढवत वाढवत चालल्या होत्या. लाटा त्यांना तब्बल चौदा किलोमीटर्स अंतरापर्यंत घेऊन गेल्या होत्या… ओरडून काहीही फायदा नव्हताच… सर्वांच्या अंगावर Life Jackets होती… यामुळेच ते समुद्रात पडले तरी बुडणार नव्हते सहजी. परंतु वारा, थंड आणि खारे पाणी… आणि शार्क मासे! तरीही जोराचे प्रयत्न करीत हे कुटुंब किना-याकडे येण्याचा प्रयत्न करीत राहिले… दहा किलोमीटर्सचे अंतर त्यांनी पारही केले होते… सर्वांना आपण निश्चित किना-यावर पोहोचू, आपल्याला वाचवायला कुणीतरी येईल, असे वाटत होते. पण काहीच झाले नाही… अंधार पडण्याची चिन्हे होती… आपण किना-यापर्यंत पोहत जावे आणि मदत मिळवावी, असे जोनला वाटले… पण दोन लहान मुलांना असं समुद्रात सोडून येणं तिला पटेना… मग तिने एक निर्णय घेतला… ऑस्टिनने कयाक घेऊन किना-याकडे निघावे… आम्ही paddle बोर्ड धरून तरंगत राहू… त्याला पाठवावे! ऑस्टिनने कयाक पुढे काढली.. त्याच्याही अंगावर life jacket होतेच… तो नजरेआड झाला! लाटा कमी होण्याचे मात्र नाव घेईनात!

अंधार पडू लागला… आपण पोराला पुढे पाठवून चूक तर नाही ना केली? आईचं हृदय विचार करून रडू लागलं! बराच वेळ झाला… कुणीही मदतीला आलं नव्हतं!

 इकडे ऑस्टिन कयाकने पुढे पुढे सरकत असताना त्याच्या लक्षात आलं की आपण काही फार पुढे जाऊ शकत नाही आहोत… त्याने पाण्यात उडी घेतली… पण life jacket सुद्धा जड झाले आहे… त्यामुळे पोहण्याचा वेग कमी होतो आहे.. त्याने ते काढून फेकले… आणि त्याला जितक्या पद्धतीने पोहता येत होते त्या त्या पद्धती त्याने अवलंबल्या… ब्रेस्ट स्ट्रोक, back stroke, survival swimming इत्यादी. त्याच्या मनात काय सुरु होतं यावेळी? मला आज किना-यावर पोहोचायचेच आहे… मी आज मरणार नाही… माझ्या कुटुंबाला मरु देणार नाही! ऑस्ट्रेलियन लोक today या शब्दाचा उच्चार साधारणत: to die असा करतात… पण ऑस्टिन मात्र not today… आज नाही… असं मनाशी म्हणत राहिला… त्याला त्याचे मित्र आठवत होते… त्याचं आयुष्य आठवत होतं.. शरीर बधीर होत चाललं होतं… आपण किती थकलो आहोत… हेही त्याला जाणवत नव्हतं… त्याला फक्त किनारा गाठायचा होता! इकडं समुद्रात असलेया जोन आणि तिच्या भावंडांनी आता आशा सोडायला सुरुवात केली… अंधार झाला होता!

ऑस्टिन किना-यावर पोहोचला… आणि कोसळला… पण दुस-याच क्षणी उठला… थकलेले पाय… वाळूतून धावू लागले… तिथून माणसं आणखी दीड दोन किलोमीटर्स दूर होती! जीवाच्या आकांताने ऑस्टिन धावला… पण त्याच्या दुर्दैवाने इंग्लीश भाषा समजू शकतील अशी माणसं त्या गर्दीत नव्हती… होती ती सारी परकीय पर्यटक माणसं होती… ऑस्टिनने आणखी पुढे धाव घेतली… फोन बूथ गाठला… ००० हा तातडीचा फोन डायल केला… आणि अगदी शांतपणे, आत्मविश्वासाने त्याची परिस्थिती कथन केली… मला हेलीकॉप्टर, विमान, बोट हवी आहे… माझी आई, माझे बहिण, भाऊ समुद्रात अडकलेत. त्याने बचाव पथकाला त्यांचा ठावठिकाणा नेमका कुठे असेल ते अचूक सांगितले… पण अंधार पडलेला होता… हेलीकॉप्टरने तो भाग पिंजून काढीत या लोकांना शोधलं… एक आधुनिक बोट त्यादिशेने भरधाव गेली… त्यांनी paddle board ळा धरून पाण्यात कसेबसे तग धरून राहिलेल्या त्या तिघांना वर उचलून घेतले… जोनने विचारले… ऑस्टिन? बचावकर्त्यांनी ऑस्टिन सुखरूप असल्याचे सांगितल्यावरच जोनचा जीव स्थिर झाला! किना-यावर पोहोचताच ऑस्टिनने जोनला आलिंगन दिले… भाऊ, बहिणीला जवळ घेतले… वैद्यकीय उपचारांनंतर या सर्वांना घरी सोडण्यात आले… Austin Applbee हा तेरा वर्षांचा पोरगा… not today… not today… not today म्हणत मृत्यूला हरवणारा पोरगा… हिरो ठरला आहे! जीवन अनमोल आहे… ते वाचवण्यासाठी ऐनवेळी शरीरही त्याच्या मर्यादा ओलांडून जाऊ शकते… फक्त जिद्द हवी… हेच यातून सिद्ध झाले.

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares