☆ भावनेचा उद्रेक होणे म्हणजे काय? ☆ सुश्री सुरेखा चिखलकर☆
भावनेचा उद्रेक होणे म्हणजे काय असते, असे जेव्हा कोणी विचारत तेव्हा असंख्य उदाहरण सांगता येतील.
अनेकदा आपणही रागाच्या भरात आपल्या जवळच्या व्यक्तीला वाटेल तसे बोलतो, प्रसंगी हात सुद्धा उचलतो.खरच हा राग व्यक्त करायचा योग्य मार्ग आहे का? राग हा व्यक्त करणे खरच गरजेचे आहे का? खर तर राग ही सुद्धा एक भावना आहे आणि कोणतीही भावना व्यक्त न करता दाबून ठेवल्याने नुकसान होतच असते.भावना सगळ्याच वेळीच व्यक्त करणे जरूरी असते, राग ही वेळेवर व्यक्त करणे तसेच जरूरी आहे.पण कुठलीही गोष्ट अति प्रमाणात व्यक्त करणे वाईटच.
राग असो वा प्रेम किंवा अजून कुठलीही भावना जर अति प्रमाणात दाबून ठेवली तर, तेवढीच ती उफाळून वर येते.पण आपल्या भावना जर आपल्या हातात नसल्या तर, मग आपल्याला नीट जगता येत नाही.माणसाच्या भावना ह्या त्याच्या जगण्यातला सगळ्यात मोठा मार्ग आहे.माणसाच्या भावना ह्या त्याच्या जगण्याचा मोठा आधार आहेत.त्या मनात दाबून ठेवल्याने किंवा वेळीच न व्यक्त न केल्यास त्याचा त्रासच होतो.
भावना व्यक्त करण्याचं सगळ्यात मोठं साधन आहे ते म्हणजे शब्द, बोलणे.आता या क्षणी मला काय वाटते ते शब्दातून बोलून टाकावे.बोलणे, संवाद साधणे हे भावना व्यक्त करण्याचे चांगले साधन आहे, किंवा मला आता याक्षणी काय करावेसे वाटतेय ते करून मोकळे व्हावे.आपल्याकडे असणारे पाळीव प्राणी नाही का, त्यांच्या भावना पूर्ण करूनच घेतात.जसे एखादा कुत्रा मांजर आपण त्याला जवळ घ्यावे म्हणून उड्या मारतच राहतो.राग आला की भुंकतो, मग आपण तर माणूस आहोत आपल्याकडे भावना व्यक्त करायला अनेक मार्ग आहेत अगदी आनंद झाला की उड्या मारव्यात, ओरडावे.पण, आपण माणूस स्वतःच्या खोट्या प्रतिष्ठेचा एवढा बाऊ करतो की विचारू नये. आपण आपल्या खोट्या कल्पना, खोट्या धारणा एवढ्या जीवापाड जपत राहतो.खऱ्या खुऱ्या भावना जगायचं विसरूनच जातो आणि मग एका क्षणी त्या भावनांचा उद्रेक होतो, आपला राग सगळ्या सदसदबुद्धीला बाजूला सारतो आणि त्वेषाने बाहेर पडतो.त्या क्षणी आपण कोणताही विचार करूच शकत नाही.ही कृती घडून गेल्यावर काय उरते फक्त आणि फक्त पश्चाताप.. पण, त्याचा उपयोग काय?
– – भावनेशिवाय माणूस जगू शकत नाही.. पण त्या भावनांचे व्यवस्थापन करणे खूप गरजेचे आहे आणि तेही वेळेवर.
” मित्रांनो काळजी घ्या….”
☆
सुश्री सुरेखा चिखलकर
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ विचार तर कराल ?– लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆
विचार तर कराल…?
हायवेवरील कोणत्याही स्वस्त ढाब्यात जेवायला गेलात तर मेनूमध्ये किमान ६ पदार्थ पनीरचे असतात. ५ स्टार हॉटेलमध्ये गेलात, तर वेजिटेरियन सेक्शनमध्ये ६०% डिशेस पनीरच्या असतात.
३० रुपयांत ६ पनीर मोमोज?
५० रुपयांत पनीर पिझ्झा?
१०० रुपयांत बटर पनीर?
४० रुपयांत पनीर कुलचा?
२० वर्षांपूर्वीही, मी जेव्हा सांगायचो की मी पनीर खात नाही, तेव्हा लोक म्हणायचे, “इतकी प्रोटीनयुक्त गोष्ट का नाही खात?” तेव्हापासून मला वाटायचं की हा पनीर खरा नसावा. मग मी घरीच पनीर बनवायला सुरुवात केली. मी ७० रुपयांत १ लिटर #अमूलचं फुल क्रीम दूध घेतो, त्यातून साधारण २०० ग्रॅम पनीर मिळतो. म्हणजेच, १ किलो पनीर बनवण्यासाठी ५ लिटर दूध लागते, ज्याची किंमत ३५० रुपये होते. म्हणजेच, खऱ्या दुधाचा पनीर बनवला तर त्याची किमान किंमत ३५० रुपये तरी येते. जर दुधाचा फॅक्टरी भाव लिटरला ५० रुपये धरला तरीही, फक्त दुधासाठी २५० रुपये खर्च येतो. यात मजुरी, गॅस, इंधन वगैरे जोडल्यास हा खर्च ६० रुपयांपर्यंत पोहोचतो. सप्लाय चेन, लॉजिस्टिक्स वगैरे जोडल्यास ही किंमत ६३ रुपयांपर्यंत जाते.
म्हणजेच, किमान ३१५ रुपये किलो खर्च येऊन, जर दुकानदाराने १०% नफा घेतला (जो प्रत्यक्षात त्यापेक्षा जास्त असतो), तर ग्राहकाला तो पनीर किमान ३४५ ते ३५० रुपये किलो भावाने मिळाला पाहिजे. आता जर तुम्ही २०० किंवा २५० रुपयांत किलो पनीर घेत असाल, तर दुकानदाराने दानछत्र उघडलं आहे का, जे तो तुम्हाला खर्चापेक्षा २५% कमी दरात विकतो? खऱ्या पनीरची किंमत आणि प्रमाण समजून घ्यायचं असेल, तर घरी पनीर बनवून पहा, कळेल.
मग येतो अनालॉग पनीर म्हणजे पनीरसारखा दिसणारा आणि त्याच्या टेक्स्चरसारखा पदार्थ, ज्याचे मुख्य घटक म्हणजे पावडर दूध, वनस्पती तेल, पाम ऑइल, अरारोट, स्टेबिलायझर्स आणि डेव्हलपिंग एजंट्स. पावडर मिल्कमध्ये फॅट नसल्यामुळे, त्यात डालडा आणि पाम ऑइल मिसळलं जातं, ज्यामुळे त्याची घनता वाढते. ही तेलंच ती आहेत, जी आपल्या रक्तवाहिन्यांत जमून जातात. हा अनालॉग पनीर तुम्हाला मोठ्या ५ स्टार हॉटेल्समध्येसुद्धा मिळतो, भले तुम्ही पनीर टिक्का खात असाल किंवा पनीर दो प्याजा…
याहूनही खालच्या दर्जाचा असतो युरिया, डिटर्जेंट आणि मैद्याच्या मिश्रणातून बनवलेला पनीर म्हणजे तो पनीर, जो तुम्ही ३० रुपयांत ६ मोमोजमध्ये किंवा ५० रुपयांत पनीर लोडेड पिझ्झा बर्गरमध्ये खात आहात. हा युरिया थेट तुमच्या मूत्रपिंड आणि यकृतावर हल्ला करतो आणि दीर्घकाळ सेवन केल्यास जीवघेणा ठरू शकतो.
भारतात दररोज ६४ कोटी लिटर दूध उत्पादन होते. जर हे सर्व दूध फाडून पनीर बनवलं गेलं, तर साधारण १ कोटी २० लाख किलो पनीर बनू शकतो. पण दररोज पनीरचा वापर साधारण १५, ००० टन आहे. हे शक्य आहे का, की १ कोटी ५० लाख किलो पनीर ६४ कोटी लिटर दुधातून बनेल?
बाजारात मिळणाऱ्या ८०% पेक्षा जास्त पनीर नकली आहे. हे नकली पनीर रस्त्याकडच्या ढाब्यांपासून ते ५ स्टार हॉटेल्सपर्यंत सर्वत्र वापरलं जात आहे. गेल्या ३० वर्षांत यकृत आणि मूत्रपिंडाच्या रोगांमध्ये जबरदस्त वाढ झाली आहे, यामागचं कारण काय?
कधीतरी त्या छोट्या छोट्या गल्ल्यांमध्ये जाऊन बघा, जिथे युरियाची मोठमोठी पातेली उकळत असतात. जे लोक ते बनवत आहेत, त्यांना सांगा की, ते स्वतःच बनवलेला पनीर खाऊन दाखवावा.
पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही हॉटेलमध्ये पनीरची डिश ऑर्डर कराल, तेव्हा सांगा की, एक कच्चा पनीरचा तुकडा आणून दाखवावा. मी नक्की सांगतो, ते हजार बहाणे करतील. मी हे अजमावून पाहिलं आहे. एका रेस्टॉरंटवाल्याने तर मला साफ सांगितलं, “जेवायचं असेल तर जेवा, नाहीतर जा. आम्ही सॅम्पल दाखवणार नाही. “
दुग्धजन्य पदार्थ हा आजच्या काळातील सर्वात मोठा घोटाळा आहे. दुर्दैवाने, सरकारसुद्धा याबाबत काही करू शकत नाही. नकली उत्पादनं दररोज पकडली जातात, पण आपल्या कायद्यात त्यासाठी फक्त काही दंड किंवा छोटीशी शिक्षा आहे. यामुळे होणाऱ्या लाखो अप्रत्यक्ष मृत्यूंसाठी त्यांना जबाबदार धरलं जात नाही.
☆
लेखक : अज्ञात
प्रस्तुती – श्री सुनीत मुळे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ वाचन नसलेली पिढी म्हणजे – लेखक : एक भारतीय अभियंता☆ प्रस्तुती – सौ अंजली दिलीप गोखले ☆
वाचन नसलेली पिढी म्हणजे आशा नसलेली पिढी – –
“शांघायला जाणाऱ्या फ्लाइटवर, झोपेच्या वेळी, केबिनचे दिवे बंद होते; मी लोकांना iPads वापरून जागे करताना पाहिले, मुख्यतः आशियाई; ते सर्व गेम खेळत होते किंवा चित्रपट पहात होते.”
खरंतर मी तो पॅटर्न पहिल्यापासून पाहिला.
जेव्हा मी फ्रँकफर्ट आंतरराष्ट्रीय विमानतळावर होतो तेव्हा माझ्या लक्षात आले की बहुतेक जर्मन प्रवासी शांतपणे वाचत होते किंवा काम करत होते, तर बहुतेक आशियाई प्रवासी खरेदी करत होते आणि किंमतींची तुलना करत हसत होते.
आजकाल अनेक आशियाई लोकांना बसून पुस्तके वाचण्याचा धीर नाही.
एकदा, एक फ्रेंच मित्र आणि मी एका रेल्वे स्टेशनवर ट्रेनची वाट पाहत होतो आणि या मित्राने मला विचारले: “सर्व आशियाई चॅट किंवा इंटरनेट का सर्फ करतात, परंतु कोणीही पुस्तके का वाचत नाही?”.
मी आजूबाजूला पाहिले, आणि खरंच ते होते.
लोक फोनवर बोलतात, मजकूर संदेश वाचतात, सोशल मीडियावर सर्फ करतात किंवा गेम खेळतात.
ते मोठ्याने बोलण्यात किंवा सक्रिय असल्याचे ढोंग करण्यात व्यस्त आहेत;
गहाळ असलेली एकमेव गोष्ट म्हणजे शांतता आणि विश्रांतीची भावना.
ते नेहमी अधीर आणि चिडखोर, रागावलेले आणि तक्रार करणारे असतात…
प्रसारमाध्यमांच्या मते, चीनमध्ये सरासरी व्यक्ती प्रतिवर्षी केवळ ०.७ पुस्तके, व्हिएतनाममध्ये ०.८ पुस्तके, भारतात १.२ पुस्तके आणि कोरियामध्ये प्रतिवर्षी ७ पुस्तके वाचतात.
केवळ जपान पाश्चात्य देशांशी तुलना करू शकतो ज्यात प्रति व्यक्ती प्रति वर्ष 40 पुस्तके आहेत;
एकट्या रशियामध्ये प्रति व्यक्ती प्रति वर्ष 55 पुस्तके आहेत.
2015 मध्ये, 44.6% जर्मन लोक आठवड्यातून किमान एक पुस्तक वाचतात – नॉर्डिक देशांसाठी समान संख्या.
आकडेवारी दर्शवते की वाचन नापसंत होण्याची तीन मुख्य कारणे आहेत – – –
– – एक म्हणजे लोकांची खालची संस्कृती (शिक्षण नव्हे).
त्यामुळे लोक नेहमी भेटल्यावर खूप बोलतात आणि कंटाळा न येता दिवसभर गप्पा मारतात.
ते नेहमी इतर लोकांच्या कथांबद्दल उत्सुक असतात, सतत सामाजिक नेटवर्क अद्यतनित करतात आणि संप्रेषणाच्या महत्त्वपूर्ण गरजा असतात.
– – दुसरे म्हणजे, त्यांना लहानपणापासून वाचनाची चांगली सवय लावली जात नाही.
त्यांच्या पालकांना पुस्तके वाचण्याची सवय नसल्याने तरुणांना त्यांच्या जीवनाच्या सुरुवातीपासूनच त्यांच्या संगोपनात तसे वातावरण मिळत नाही.
लक्षात ठेवा, मुलाचे व्यक्तिमत्त्व प्रामुख्याने कुटुंबाद्वारे घडवले जाते.
– – तिसरे म्हणजे ‘परीक्षाभिमुख शिक्षण’, त्यामुळे लहान मुलांना बाहेरची पुस्तके वाचायला वेळ आणि ऊर्जा मिळत नाही.
बहुतेक ते पुस्तके देखील वाचतात, म्हणून ते परीक्षांसाठी असतात.
जुन्या अभ्यासपद्धतीच्या वातावरणामुळे अभ्यासाची सवय लागणे, पदवी मिळवणे आणि नंतर वाचन करणे बंद झाले.
इस्त्राईल आणि हंगेरी हे जगातील सर्वाधिक वाचले जाणारे दोन देश आहेत.
इस्रायलमधील सरासरी व्यक्ती वर्षाला ६४ पुस्तके वाचते.
मुलांना समजायला लागल्यापासून, जवळजवळ प्रत्येक आई आपल्या मुलांना शिकवते: “पुस्तके हे शहाणपणाचे भांडार आहेत, जे पैसे, खजिना आणि शहाणपणापेक्षा अधिक मौल्यवान आहेत जे कोणीही तुमच्यापासून हिरावून घेऊ शकत नाही.
हंगेरीमध्ये सुमारे 20, 000 लायब्ररी आहेत आणि 500 लोकांमागे सरासरी एक लायब्ररी आहे;
लायब्ररीत जाणे हे कॉफी शॉप किंवा सुपरमार्केटमध्ये जाण्याइतकेच चांगले आहे.
हंगेरी हा जगातील सर्वात लक्षणीय पुस्तके वाचणारा देश आहे, ज्यात दरवर्षी 5 दशलक्ष लोक नियमितपणे वाचतात, देशाच्या लोकसंख्येच्या एक चतुर्थांशपेक्षा जास्त.
ज्यू हे एकमेव लोक आहेत ज्यांना निरक्षर नाही;
भिकाऱ्यांकडेही नेहमी पुस्तक असते.
त्याच्या दृष्टीने पुस्तके वाचणे हा लोकांचा न्यायनिवाडा करण्याचा उत्कृष्ट गुण आहे.
जे लोक वाचतात त्यांची विचार करण्याची पद्धत खूप वेगळी असते आणि त्यांच्याकडे चमकदार कामगिरी नसली तरी त्यांची मानसिकता खूप चांगली असते.
पुस्तकांचा केवळ व्यक्तीवर परिणाम होत नाही;त्याचा समाजावर परिणाम होतो.
ज्ञान ही शक्ती आहे आणि ज्ञान ही संपत्ती आहे. जो देश किंवा व्यक्ती पुस्तके वाचणे आणि ज्ञान संपादन करणे याला महत्त्व देतो तो नेता असेल.
एक महान विद्वान एकदा म्हणाले: “एखाद्या व्यक्तीच्या विचारांच्या विकासाचा इतिहास हा त्याचा वाचन इतिहास आहे. किती लोक पुस्तके वाचतात आणि कोणत्या प्रकारची पुस्तके निवडतात हे ठरवते की समाजाचा विकास होईल की मागे राहील.”
लक्षात ठेवा: वाचनाशिवाय शर्यत ही आशा नसलेली शर्यत आहे.
– एका भारतीय अभियंत्याच्या पत्राचा उतारा.
प्रस्तुती : अंजली दिलीप गोखले
मोबाईल नंबर 8482939011
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ ।। श्री नारद उवाच ।। – नारद भक्ति सूत्रे — सूत्र २७ ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले☆
।। श्री नारद उवाच ।।
नारद भक्तीसूत्र – २७.
ईश्वरस्याप्यभिमानद्वेषित्वात् दैन्यप्रियत्वाच्च ॥ २७ ॥
अर्थ: ईश्वराचाही अभिमानाशी द्वेषभाव आहे व दैन्याशी म्हणजे लीनतेशी प्रियभाव आहे.
विवेचन : मागील पंचविसाव्या सूत्रात भक्ती ही कर्म, ज्ञान व योग यांहून श्रेष्ठ आहे, असे सांगितले आहे आणि ती फलरूपा आहे असे पुढे सूत्र सव्वीसमध्ये म्हटले आहे.
कर्म, ज्ञान व योग या साधनांत अहंकार उत्पन्न होण्याचा संभव असतो. कर्म करणारी मंडळी कर्मठ होताना आपण पाहतो आणि अशा लोकांना कर्माभिमान, ज्ञानी लोकांना ज्ञानाभिमान आणि योगी लोकांना योगाभिमान होण्याची शक्यता जास्त असते.
सामान्यतः विचार केला तर आपल्या लक्षात येईल की अभिमान कोणाला नसतो…? अहो, हुशार माणसाला असतो, ढ माणसाला असतो, अनाडी माणसाला असतो, खेड्यातल्या माणसाला असतो, शहरातील माणसाला असतो, जवळजवळ सर्वांना असतो….! अहो, एखादा भिकारी एखाद्याच्या घरी भीक मागायला आला तर त्याला मी भीक देण्या इतपत मोठा आहे याचा अभिमान असतो आणि एखाद्याने त्या भिकाऱ्याला भीक देत नाही म्हटलं, तर तो भिकारी त्याला म्हणतो, की तुझे काही शेवटचे घर नाही, अख्खा गाव आहे मी तिथे जाऊन भीक मागेन….! थोडक्यात हा अभिमान कमीअधिक प्रमाणात सर्वांना असतो.
एका भक्ताचे उद्गार प्रसिद्ध आहेत चाखाचाहे प्रेमरस राखाचाहे मान । दो खड्ग एक म्यानमें देखे सुने न कान ॥’ याबद्दल एक कथा प्रसिद्ध आहे.
– – ज्याप्रमाणे एका म्यानात दोन तलवारी रहात नाहीत, त्याप्रमाणे जिथे अभिमान असतो, तिथे भक्ति रहात नाही, आणि अर्थातच तिथे भगवंत राहूच शकत नाही. किंबहुना खरा भक्त कधीच मी काही करतो असे म्हणूच शकणार नाही. तो म्हणेल भगवंताच्या कृपेनं झालं….!
एक छोटीशी कथा आहे. कदाचित आपल्याला माहित असेल. दोन शिष्य तपश्चर्या करीत होते. दोघांनी १२ वर्षे तपश्चर्या केली. बारा वर्षे पूर्ण होताच देव प्रसन्न झाला. दोघांना म्हणाला की दोघांची तपश्चर्या उत्तम चालू आहे. पण तुम्ही दोघांनी आणखी १२ वर्षे तपश्चर्या करण्याची गरज आहे. त्यावर एक पटकन तयार झाला. तो म्हणाला, इतकेच ना, देवा तुला यात आनंद आहे ना, मग मी अगदी मनापासून आणिक १२ वर्षे तप करेन. दुसरा जरा वैतागला. तो म्हणाला देवा, अमुक माणसाने फक्त चार वर्षे तप केले, त्याच्यावर तू लगेच प्रसन्न झालास, माझ्या बाबतीत तू पक्षपात करत आहेस…!
गोष्ट इथे संपली…
आपल्याला अनेक उदाहरणे माहित आहे. दौपदिला कृष्णाने वस्त्र पुरवली..! कधी पुरवली? जेव्हा ती संपूर्ण शरणागत झाली, देवा, आता तुझ्याशिवाय माझे कोणी नाही, तू माझी लाज राख…!
सर्वसामान्य मनुष्याला स्वतःवर, त्याच्या आप्तस्वकीयांवर विश्वास असतो, साठवलेल्या पैशावर विश्वास असतो…..! जेव्हा मनुष्यावर प्रसंग येतो, तेव्हा मात्र देवाशिवाय आपले कोणी नाही, याची अल्पशी जाणीव त्याला होत असते…..! जे अशा जाणिवा अधिक दृढ करू शकतात, ते साधक अवस्थेला जातात आणि हळूहळू आपली प्रगती साधून घेत असतात…
.. देवाला दैन्य आवडते असे या सूत्राच्या शेवटी सांगत आहेत. दीन म्हणजे गरीब असा एक अर्थ आहे. अर्थात सर्वच बाबतीत गरीब.
अमुक एक वेडे एकत्र तरी त्यातून एक शहाणा मनुष्य तयार होईल असे म्हणणे ज्याप्रमाणे मूर्खपणाचे होईल, अगदी त्याचप्रमाणे मी देवापेक्षा मोठा होईन, असे म्हणणे धाडसाचे होईल.
देवळात जाताना चप्पल बाहेर काढणे म्हणजे आपला अभिमान बाहेर काढून ठेवण्यासारखे आहे. पूर्वी आई सोवळी बसायची. तेव्हा आई जवळ जायचे असल्यास सर्व कपडे काढून जावे लागायचे. देव आणि सोवळ्यातील आई यात विशेष फरक नाही. देवासमोर जाताना आपण दीन होऊन जावे. थोडक्यात संपूर्ण शरणागत होईन जावे. मी नाही तूच आहेस असा दृढ भाव ठेवता आला तर देव लवकर भेटू शकतो….!
श्रीमंतीची व्याख्या संत पुढील प्रमाणे करतात. ज्याची मागणी जितकी कमी तितका तो जास्त श्रीमंत सामान्य मनुष्याला कितीही मिळालं तरी ते पुरेसे होत नाही, त्यामुळे त्याचे दैन्यपणा संपत नाही.
.. सद्गुरू श्रीगोंदवलेकर महाराज म्हणतात, सर्व देण्याची गरज नसते फक्त सर्व स्व देता आला तरी त्याला देवाची प्राप्ती होऊ शकते….!!
कृपा हा ईश्वराचा स्वभाव आहे. मेघाचा स्वभाव वर्षाव करणे, चंद्राचा शीतलता देणे, सूर्याचा प्रकाश, त्याप्रमाणे दयामय प्रभूचा स्वमाव दीनावर प्रेम करून त्याचे दैन्य दूरर करणे हाच आहे. आर्त द्रौपदी, गजेंद्र दीन शबरी, सुदामा या सर्वांची उदाहरण याची साक्षभत आहेत. तत्त्वतः सर्व जीव स्वभावतः दीनच आहेत, परतंत्र आहेत ते त्या पूनी अंशभूतच आहेत. म्हणून परमात्म्याचे त्यांच्यावर सहज प्रेम असणारच, परंतु अनादी अज्ञानजन्य अभिमानामुळे ते स्वतःस दीन व ईश्वराचा अंश समजत नाहीत व ईश्वरप्रेमाची अपेक्षाही करीत नाहीत. तो अभिमान हा आपल्या अंशभूत जीवांना घातक असतो. म्हणूनच ईश्वर त्या अभिमानाचा द्वेष करतो व तो दूर करतो. तसेच जीवास अभिमान बाळगण्याचा अधिकार नाही असे समजून जे स्वतःस दीन समजतात त्यांच्यावर प्रेम करतो असे नारदमहर्षी या सूत्राच्या द्वारे सांगत आहेत.
☆ “दुसरा चंद्रही आभाळी धाडणारी आई!” ☆ श्री संभाजी बबन गायके ☆
आभाळातला चंद्र सूर्यानं त्याच्या पोतडीत लपवून ठेवला की अमावस्या नावाचा अंधार दाटून येतो. वाटतं… आता जगाला उजेड नावाच्या अमृताचं दर्शन या जन्मी काही घडणार नाही. मग प्रतिपदेची प्रतीक्षा अपरिहार्य होऊन जाते… पण तोवर आभाळाचा जीव खालीवर होत राहतो. देश नावाच्या आभाळाला असं चंद्राशिवाय फार क्षण राहता येत नाही. हे आभाळ मग पृथ्वीकडे आशेने पाहतं… आणि किमान आपली मराठी माती तरी त्याला विन्मुख पाठवीत नाही.. अन्यथा या देशाच्या ललाटी आणखी एक कायमचा अंधार लिहिला गेला असता!
… तिचं नाव तारा…. ताराबाई…. मराठ्यांच्या इतिहासात अमर झालेल्या राणीसाहेबांचे नाव. तिच्या पदरात दैवाने एक नव्हे दोन नव्हे… तीन चंद्र घातले. रवी, राम आणि सुभाष. या मुलांच्या नावांपुढे तिने मोठ्या हौसेने चंद्र रेखून घेतला.
… अयोध्येच्या दशरथ राजेसाहेबांच्या राणीसाहेब कौसल्या यांचे सुपुत्र श्री राम यांनी चंद्र खेळायला पाहिजे.. असा हट्ट धरला होता. हिच्या रामाच्या नावातच चंद्र होता. या रामचंद्राने असुरांच्या विनाशासाठी शस्त्र हाती धरले आणि तो वयाच्या एकविसाव्या वर्षी म्हणजे २५ जानेवारी २००२ रोजी फौजेत भरती झाला. जन्मापासून म्हणजे २८ जून, १९८१ पासून गोव्याच्या सुंदर भूमीत बालपण, आणि तारुण्यातील आरंभीची वर्षे व्यतीत केलेला रामचंद्र. कुठे सुंदर गोव्याची भूमी आणि कुठे डोंगर, पहाडांनी वेढलेल्या सीमा. राजस्थानचे वाळवंट त्याला नारळ पोफळीच्या बागांची याद करून द्यायच्या. पाण्याचा समुद्र आणि सियाचीन मधला बर्फाचा समुद्र… बरोबरी कशी होणार?
त्याचं खरं काम नव्हतं शस्त्र चालवण्याचं. सेनेला अभियांत्रिकी साहाय्य करण्यासाठी त्याची नेमणूक होती…. कोअर ऑफ इंजिनियर्स मध्ये तो सॅपर बनला! आपल्या सैन्यासाठी पूल, इमारत उभारून देणे, शत्रूसाठी भूसुरुंग पेरून ठेवणं, वेळप्रसंगी ते शोधून निकामी करणे, युद्धात शत्रूचे पूल, इमारती उध्वस्त करणं या कामांत रामचंद्र निपुण झाले. पण प्रत्येक सैनिकाला शत्रूवर थेट चालून जात त्याच्याशी दोन हात करायला आवडत असतं… किंबहुना सैन्यात असणं म्हणजे युद्ध… आणि रामचंद्र यांना ही संधी चालून आली.
काम कोणतंही असो, सेनेत प्रत्येकाला शस्त्रास्त्रे चालवायला शिकवलं जातं. योगायोगाने सॅपर रामचंद्र शिवाजीराव शिंदे यांना ४४, राष्ट्रीय रायफल्स मध्ये Deputation वर काश्मीरमध्ये बोलावून घेण्यात आले. आता रामचंद्र यांची भूमिका बदलली होती. नव्या तुकडीत नवे वातावरण आणि प्रचंड ताणतणाव याला हा तरणाबांड गडी सरावला.
बारा ऑक्टोबर दोन हजार सहा… दुपारचा एक वाजलेला आहे… मोठी खबर मिळाली होती. शोपियां मध्ये बगेंदर मोहल्ला नावाच्या गावात काही अतिरेकी एका छोट्या घरात डेरा टाकून बसल्याचे समजले… Quick Reaction Team त्वरीत सज्ज ठेवण्याचे आदेश दिले गेले….. या मोहिमेवर तसे सर्वच जायला उत्सुक असतात.. स्वयंस्फूर्तीने रामचंद्र यांनी त्वरित जणू धनुष्यबाण हाती घेतले… छोट्या का असेना.. रावणाशी युद्ध करण्याची संधी आयती चालून आली होती.. पूर्ण तयारीनिशी भारतीय सेना ठरलेल्या लक्ष्यावर चालून गेली. डोंगर, झाडी, दऱ्या आणि स्थानिकांचा अतिरेक्यांना पाठिंबा इत्यादी अडथळे पार करीत आपल्या सेनेने अतिरेक्यांच्या आश्रयस्थानास वेढा घातला! काश्मिरातील युद्ध वेगळं आहे. अनुभवातून शिकत शिकत आपण एक तंत्रशुद्ध पद्धती अंमलात आणलेली आहे. अतिरेकी लपलेल्या/असलेल्या ठिकाणाला नियोजनबद्ध पद्धतीने दोन-तीन वेढे घातले जातात. सोबत सुसज्ज लष्करी वाहने असतात, शक्य तिथे वैद्यकीय पथके सोबत असतात, परिस्थिती पाहून कमी-अधिक क्षमतेची स्फोटके वापरली जातात. हल्ली तर ड्रोन, नाईट विजन कॅमेरा इत्यादी आधुनिक आयुधं हातात आहेत. पण आधीच्या काळात अशा सुविधा नव्हत्या… तरीही भारतीय फौजेने केवळ शौर्य आणि अभ्यासपूर्ण व्यावसायिकतेच्या बळावर ही निकराची लढाई जारी ठेवली आहे…. हे युद्ध दीर्घकाळ चालणार आहे! यात दिल्या जाणा-या बलिदानांची दखल घेण्यात भारतीय जनमानस तितकेसे घेताना दिसत नाही, हे दुर्दैवच. असो.
पण आज परिस्थिती मोठी नाजूक होती! अतिरेकी आणि सेना यांमध्ये एका शाळेची इमारत येत होती… न्यू ग्रीनलॅंड स्कूल…. थोडीथोडकी नव्हे तर सुमारे चौदाशे विद्यार्थी असलेली शाळा… वर्ग सुरू आहेत… अतिरेक्यांना भारतीय सेनेच्या तावडीत आपण फसल्याची जाणीव झाली. त्यांनी आततायी पाऊल उचलण्याआधी या विद्यार्थ्यांना तेथून सुरक्षित हलवणे क्रमप्राप्त आणि अतिप्रधान्याचे होते. मुख्य भीती होती ती म्हणजे अतिरेक्यांनी शाळेतल्या विद्यार्थ्यांची ढाल बनवली तर? अतिरेक्यांना प्रत्युत्तर देताना शाळा आड येणार होती. अतिरेकी भारतीय जवानांना पाहू शकत होते…. आणि त्यांच्यावर नेम सुद्धा धरू शकत होते… तशीच परिस्थिती आपल्या सैनिकांची सुद्धा होती!
लगेचच काही कारवाई केल्याशिवाय गत्यंतर नव्हते. अतिरेक्यांना आपले जवान तिथून पळून जाऊ देणार नव्हते… पण या धुमश्चक्रीत जर ते अतिरेकी शाळेत पोहोचले, त्यांनी विद्यार्थ्यांना ओलीस ठेवले तर? केवळ काल्पनेनेच हृदयाचा थरकाप उडावा! शाळेतील निष्पाप जीवांना युद्धक्षेत्राच्या बाहेर काढून सुरक्षित ठिकाणी पोहोचवणे गरजेचे आहे… सुरुवातीला बाहेरच्या बाजूला असलेल्या सुरक्षावेढ्यात रामचंद्र यांची नेमणूक होती… त्यांनी आग्रहाने वरीष्ठांची परवानगी मिळवली आणि ते त्वेषाने पुढे झाले! यासाठी त्यांना आडोसा सोडून बाहेर यावे लागले… रामचंद्र आणि त्यांचे साथीदार वेगाने शाळेत घुसले… लहान लहान गट करून त्यांनी मुलांना बाहेर काढायला आरंभ केला आणि अपेक्षेनुसार अतिरेक्यांना गोळीबार सुरु केला. त्यातून जीवाची बाजी लावीत रामचंद्र आणि इतर बहाद्दरांनी जवळपास सर्वच विद्यार्थ्यांना तेथून बाहेर काढण्यात यश मिळाले… पण यात वेळही तेवढाच लागला. या सैनिकांवर अतिरेकी अधून मधून गोळीबार करायला मागेपुढे पहात नव्हते… विद्यार्थ्यांना गोळ्या लागतील याची त्यांना तमा नव्हती…. आणि भारतीय सैनिक स्वत:चा जीव गमावून मुलांना वाचवणार होते, यात शंका नव्हती! शाळा रिकामी झाली की सेना पुढे सरकून आपल्याला ठार मारणार याचा अंदाज आल्याने ते अतिरेकी बिथरले… त्यांनी या शेवटच्या गटाच्या दिशेने बेफाम गोळीबार सुरु केला…. रामचंद्र प्रत्युत्तर देऊ शकत होते… पण त्यांनी कमालीचा संयम ठेवला…. ती लेकरं आणि मृत्यू यांच्यात रामचंद्र शिवाजीराव शिंदे नावाचा एक अभेद्य पर्वत उभा ठाकलेला होता… छातीचा कोट करणं म्हणजे काय याचा हा वस्तुपाठ. त्यांच्या हातावर गोळ्या लागल्या… आणि एक गोळी तर डोक्यावरचे शिरास्राण भेदून, डोक्याला मोठी जखम करून निघून गेली… रक्ताची धार लागली!
रामचंद्र मुलांना वाचवण्यात यशस्वी झाले… यात बराच वेळ गेला…. सहा वाजून गेले होते.. थोड्याच वेळात अंधारून येईल… अतिरेकी अंधाराचा फायदा घेऊन पळून जातात असा अनुभव होताच… तोवर अतिरेक्यांनी दुस-या घराचा आश्रय मिळवला होता. रामचंद्र यांनी ते घर बघितले होते… इतर जवानांना ते घर लगेच दृष्टीस पडणे अशक्य होते कारण… मध्ये अनेक अडथळे होते! सहका-यांनी, अधिका-यांनी रामचंद्र यांना माघारी निघून येण्याचा आग्रह धरला… पण रामचंद्र मागे फिरले नाहीत!
त्या घरात लपलेले दोन अतिरेकी रामचंद्र यांच्यावर अचूक गोळीबार करण्याच्या उत्तम स्थितीत होते…. रामचंद्र आता त्या दोन रावणांच्या रोखाने निघाले… एकटेच. हातातली रायफल उसंत घेत नव्हती… समोरून येणा-या मरणाची तमा नव्हती….. अंगावर गोळ्या झेलत रामचंद्र त्या घररुपी लंकेकडे निघाले होते… लंकादहन निश्चित होते. एक स्थानिक आणि एक पाकिस्तानी अतिरेकी…. अशी दोन लक्ष्ये साधायची होती…. रामचंद्र यांनी अचूक शरसंधान केले…. विजयादशमी साजरी झाली… दोन्ही बाजूंनी गोळीबार थांबला…. अतिरेक्यांच्या बाजूला पूर्ण शांतता….. रामचंद्र यांच्या दिशेने इतर ठिकाणी असलेले सैनिक धावत आले…. रामचंद्र यांचेही श्वास थांबलेले होते! एक चंद्र मावळून गेला…. त्याची आभा मात्र हळूहळू वाढत जाणा-या अंधाराला प्रकाशमान करीत निघाली होती!
वीरमाता ताराबाई शिवाजीराव शिंदे, राहणार चिचोलीम, मापुसा, गोवा यांचा एक चंद्र अमावास्येच्या समुदात कायमचा बुडाला होता! पुत्राच्या चितेच्या साक्षीने दुसरा सुभाष’चंद्र’ पाठवण्याचा संकल्प सोडला आणि पूर्णही केला! तरुणांनी सैन्यसेवेत जावे, असे वीरमाता ताराबाई यांचा आग्रह आहे!
भारत सरकारने हुतात्मा रामचंद्र शिवाजीराव शिंदे यांना मरणोत्तर शौर्य चक्र देऊन त्यांच्या हौतात्म्याचा गौरव केला. काल त्यांच्या बलिदानाला एकोणीस वर्षे पूर्ण झालीत. त्यांच्या गावी त्यांचे स्मारक उभारले गेलेले असून त्यांच्या बलिदानातून गोव्यातील अनेक तरुणांनी सैन्यसेवेत प्रवेश केला आहे. या वीराची पुरेशी वैय्यक्तिक माहिती मला उपलब्ध झाली नाही. तरीही हा वीर मराठी तरुणांना माहित असलाच पाहिजे म्हणून हे लेखनधारिष्ट्य! जयहिंद!!
☆ अरविंद श्रीनिवास…लेखक : श्री बिप्लव पाल☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆
अरविंद श्रीनिवास :::
Perplexityचे संस्थापक, दीड लाख कोटींची कंपनी — ज्याने अवघ्या दोन वर्षांत Googleला हादरवले!
(१) अरविंद श्रीनिवास कोण आहेत?
गेल्या दोन दशकांपासून सर्च इंजिनच्या जगात निर्विवाद वर्चस्व गाजवणाऱ्या Google ला, ज्याला Microsoft चा Bing सुद्धा तितकीशी टक्कर देऊ शकला नाही, त्याला आज पहिल्यांदा अस्वस्थ केलंय एका भारतीय तरुणाने. चेन्नईच्या मध्यमवर्गीय तमिळ कुटुंबातून आलेला अरविंद, IIT मद्रासची कठीण वाट पार करत, आज जगभर चर्चेत असलेल्या Perplexity AI या AI स्टार्टअपचा संस्थापक आहे.
Google च्या लिंक-आधारित सर्च पद्धतीला थेट आव्हान देणारे हे प्लॅटफॉर्म वापरकर्त्यांना थेट, अचूक उत्तरं देतो—तेही विश्वसनीय स्रोतांसह. अवघ्या ३० व्या वर्षी अरविंदने निर्माण केलेली ही तांत्रिक क्रांती इतिहासात नोंदली जात आहे. आणि ही तर फक्त सुरुवात आहे.
(२) चेन्नईच्या उन्हापासून सिलिकॉन व्हॅलीपर्यंतचा प्रवास – –
पहिलं प्रकरण: अनवधानातली जिज्ञासा
७ जून १९९४ रोजी जन्मलेला अरविंद, ज्याच्या घरी संगणक नव्हता. वडिलांची जुनी स्कूटर आणि रेल्वे स्टेशनातून आणलेल्या जुन्या मासिकांपासून तो छोटे-मोठे मॉडेल तयार करायचा. तांत्रिक गोष्टी हाताळून समजून घेण्याची ओढ त्याला लहानपणापासून होती.
दुसरं प्रकरण: IIT मद्रास — रक्त, घाम आणि स्वप्न
२०११, हॉस्टेल रूम D-208. भिंती ओलसर, छत गळतं. कुटुंब IITची फी परवडत नव्हती—म्हणून अरविंद दिवसात क्लास करत असे, रात्री लॅबमध्ये आणि मुलांना शिकवून फी भरायचा.
पहिला धक्का: कॅल्क्युलसमध्ये नापास.
दुसरा धक्का: एका प्राध्यापकाने रिसर्च आयडिया फेटाळून लावली—”डेटा नसल्यास आयडिया निरर्थक आहे. “
– – – त्या रात्रीच त्याने Kaggle वरून ओपन डेटा डाउनलोड केला. पहिल्यांदाच Amazon EC2 वर आपला AI मॉडेल चालवला—हॉस्टेलमध्ये लाईट्स बंद झाल्यावर, चादरीखाली लॅपटॉपच्या निळसर प्रकाशात.
त्याने शिकलं :
“जसं मशीन न चालवलं तर कार्य करत नाही, तसंच आयुष्यही प्रयत्नांशिवाय पुढे जात नाही. “
तिसरं प्रकरण: UC Berkeley — अमेरिकेची शिडी
– – २०१६, पूर्ण स्कॉलरशिपसह Berkeleyमध्ये प्रवेश. भारतातून आलेल्या सवयी लगेच गेल्या नाहीत:
– – डॉलरचं महत्त्व जाणवलं—धण्यासाठी सुद्धा खर्च करताना विचार.
– – F1 व्हिसामुळे पार्ट-टाइम जॉब करता येत नव्हता—TA-शिप करून खर्च भागवायचा.
– – अमेरिकन क्लासरूममध्ये “I disagree” म्हणणं म्हणजे थेट प्रोफेसरला विरोध—हा एक सांस्कृतिक धक्का होता.
– – पहिले दोन रिसर्च पेपर्स नाकारले गेले. तिसऱ्या पेपरसाठी त्याने १२ तास कोड री-फॅक्टर केला—आणि अखेर ICLR मध्ये “स्पॉटलाइट” मिळाला. तो आता आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर पोहोचला होता.
चौथं प्रकरण: लंडनच्या उंदरांनी भरलेल्या रात्री — DeepMind
– – २०१९, DeepMind मध्ये इंटर्नशिप. पण वीजा आणि हाउसिंगच्या अडचणींमुळे लंडनमध्ये एका सस्त्या बेसमेंटमध्ये राहायला लागलं—उंदरांमुळे झोप येईना, म्हणून ग्रंथालयाच्या सोफ्यावर रात्र काढायची.
– – संध्याकाळी ६ नंतर ऑफिस रिकामं होतं, तेव्हा तो व्हाइटबोर्डवर Transformer पेपर समजून घ्यायचा. In the Plex ही Google वरील पुस्तक वाचायचा.
– – एक दिवस त्याच्या कोडमुळे टीमचं latency २० मिलीसेकंदांनी कमी झालं—टीम लीडने कौतुक केलं. त्याने समजून घेतलं:
“संघर्ष तात्पुरता असतो, पण परिणाम कायमचा. “
(३) Perplexity ची सुरुवात: गॅरेजमधून Google पर्यंत
२०२२ च्या उन्हाळ्यात, तीन मित्रांसोबत Zoom कॉल—SQL जनरेशनवर चर्चा चालू होती, अचानक प्रश्न आला :
– – ” सर्चचा एक नवीन मार्ग का बनवू नये? “
– – – Perplexity AI हे नाव ठरलं, कारण ते भाषेतील ‘confusion’ मोजतं. उद्दिष्ट—१० लिंक नाहीत, थेट उत्तर, सोबत स्रोत.
२०२४ च्या अखेरीस, Perplexity च्या सर्च ट्रॅफिकमध्ये अचानक १० पट वाढ झाली. Google च्या एका वरिष्ठ प्रोडक्ट मॅनेजरने X (Twitter) वर लिहिलं—
“मला यांचं UI आवडत नाही, पण सर्च रिझल्ट जलद आणि उत्तम आहेत. “
Google च्या माउंटन व्ह्यू ऑफिसमध्ये तातडीने मिटिंग घेण्यात आली.
– – जगाला पहिल्यांदा जाणवलं—Googleलाही भीती वाटू शकते.
(५) अब्जोंची कंपनी, पण संघर्ष न विसरलेले –
फक्त एका वर्षात SoftBank, Nvidia, Jeff Bezos यांसारख्या मोठ्या गुंतवणूकदारांनी गुंतवणूक केली. कंपनीची किंमत १८ अब्ज डॉलर (जवळपास दीड लाख कोटी रुपये). अरविंदची वैयक्तिक संपत्ती ५०, ००० कोटींपेक्षा जास्त—पण आजही तो त्या उंदरांनी भरलेल्या रात्री विसरलेला नाही.
(६) शेवट नाही, नव्या पर्वाची सुरुवात –
अरविंद श्रीनिवासने सिद्ध केलं :
– – मध्यमवर्गीय मर्यादा अडथळा ठरत नाहीत.
– – व्हिसाच्या अटी स्वप्नांपेक्षा मोठ्या नसतात.
– – यशाची सुरुवात बेसमेंटमधल्या उंदरांपासूनही होऊ शकते.
Perplexity आज Googleची खरी स्पर्धा आहे. आणि अरविंद—भारताच्या त्या तरुण स्वप्नाचं नाव आहे, ज्याला थांबता येत नाही.
इतिहास तेच लोक लिहितात जे अडचणींपासून घाबरत नाहीत, त्यांचा सामना करतात.
अरविंदने ते करून दाखवलं—म्हणून तो आज फक्त माणूस नाही, एक प्रेरणा आहे.
साप म्हंटलं की आपण खूप घाबरून जातो. बऱ्याचवेळा आपल्या अंगणात, घरात आलेल्या सापाला आपण मारून टाकतो. खरं तर त्यातले ९० % साप हे बिनविषारी असतात. पण माणूस हा विचार करतच नाही. तसेही ते आपणहून कधीच आपल्याला दंश करत नाहीत. त्यालाही स्वत:च्या जिवाची भिती असते. आपण त्याला डिवचतो मग रागाने तो आपल्याला चावतो.
खरे तर साप हा आपला मित्रच आहे. पूर्वी साप हे जंगलात, रानात, शेतात राहणारे जीव आहेत. आपणच आता त्यांच्या अधिवासावर आक्रमणाचा अन्याय केला आहे. सृष्टीतला प्रत्येक जीव हा एकमेकांसाठी पूरक व उपयोगी आहे. साप हा शेतकऱ्याचा खरा मित्र आहे. शेतातल्या धान्यावर डल्ला मारणाऱ्या उंदरांचा तो फडशा पाडतो. उंदीर, बेडूक, अन्य कीटक हे त्याचे अन्न आहे. म्हणूनच त्यांची वस्ती शेतातल्या बिळात असते. पण चुकून आपला पाय त्यांच्यावर पडतो व स्वसंरक्षणासाठी तो आपल्याला चावतो. यामुळेच आपण साप दिसला रे दिसला की त्याच्या जिवावर उठतो. पण त्याच्यामुळेच शेतातले पर्यावरण अबाधित असते.
याशिवाय या सर्पराजांबद्दल इतर गोष्टीही आपल्याला माहीत आहे का? सर्प आपल्याला पुष्कळ गोष्टीत मदत करतात. तुम्हाला माहीतच असेल की समुद्रमंथनात वासुकीचाच उपयोग केला. त्यातून निघालेले हलाहल शंकराने प्राशन केल्यावर घशाला होणारा दाह शमवायला त्याच्या गळ्याभोवती सर्पकंठीच उपयोगाला आली. गणपतीबाप्पाच्या कंबरेला सर्पाचीच मेखला असते. नागपंचमीचा सण तर आपल्या हिंदूच्यात मोठ्या उत्साहात साजरा होतो. सणांचा महिना श्रावण तर याच्याच सुरुवातीने होतो. नदीकाठी असलेल्या वारुळातल्या या रहिवाशाला पुजायला माहेरवाशिणी, मुली, बायका मोठ्या आनंदात जातात. त्या मोकळ्या हवेत आपल्या चित्तवृत्ती प्रसन्न होतात. हवेतला प्राणवायु आपल्या पर्यावरणाची गरज आहे. श्रावणात वाचल्या जाणाऱ्या कथेतसुध्दा नागपंचमीची कहाणी असते. ही सगळी उदाहरणे नुसती पोपटपंची नाहीय तर त्यातूनही पर्यावरणाचा संदेश दिलेला आहे.
सध्या बऱ्याच प्रमाणात सर्पांबद्दल जनजागृती झालेली दिसून येते. सापांना मारण्यापेक्षा साप पकडणाऱ्याना बोलावून त्यांना जिवंत पकडून रानावनात सोडून दिले जाते. सांगली जिल्ह्यातल्या बत्तीसशिराळा या गावात नागपंचमीला बरेच नाग-साप पकडले जात होते. त्यावर सध्या बंदी घातलेली आहे. जैन धर्मात तर कुठलीही प्राणीहत्या मान्यच नाही. त्यांच्याकडे जर असे साप वगैरे निघाले तर ते मारत नाहीत.
परदेशात सापांच्या कातडीपासून पर्सेस, कोट वगैरे बनवलेल्या वस्तूंना खूप मागणी आहे, त्यासाठीही सापांची तस्करी केली जाते. पण हे सर्व करत असताना आपण आपलेच नुकसान करत आहोत हे माणसाच्या लक्षातच येत नाही. सध्या बऱ्याच ठिकाणी प्राणीमित्रांच्या संस्था निघाल्या आहेत. अशा संस्थेत इतर प्राण्यांबरोबर सापांनाही उपचार केले जातात.
एकूण साप हा आपल्याला उपयोगी प्राणी आहे. पर्यावरणाला मदत करणारा एक महत्वाचा घटक आहे हे आपण लक्षात ठेवणे गरजेचे आहे.
महेश… एक विलक्षण अवलिया माणूस… जो गेली दहा वर्ष झाली… तुमच्या छान जगण्यासाठी धडपडतोय..
———
काही अवलिया व्यक्तींचा परिचय करून देणारी सिरीज मी सोशल मीडियावर सुरु केली. तुम्ही पण सर्वानी त्याला छान प्रतिसाद दिला. त्याच मालिकेत आज भेटूया अशाच एका अवलिया व्यक्तीला!
” श्री. महेश आठवले “…
आजच्या काळातील खरोखर हा एक वेडा माणूस आहे.
जो पेशाने खरेतर “आधुनिक शेतकरी” आहे
मात्र शेतात कोणतेही रासायनिक खत न वापरता गहू, ज्वारी, हरभरा पिकवतोय. पालेभाज्या पिकवतोय. आणि हे सारं घराघरातील सर्वांच्या आहारात जावं यासाठी जीवतोड धडपड करतोय. मार्केट यार्डात ५० पैशाला एक कोथिंबीर जुडी या रेटने आडत्याला माल विकून अनेकदा तोट्यात गेला हा माणूस. पण तरी मागे हटत नाहीये. इच्छा एकच कि, पुढच्या पिढीला सकस अन्न मिळालं पाहिजे. त्याची स्पर्धा ना मॉलमधील पॉश व्हेज मार्केटशी, ना मार्केट यार्डातील व्यापाऱ्यांशी.
(खरंतर या मधल्या मंडळीमुळेच ५० पैशाची कोथिंबीर जुडी आपल्या हातात १० रुपयाला पडते) हि साखळी तोडली आणि “शेतकरी ते ग्राहक” असा थेट संपर्क झाला तर अनेक शेतकऱ्याला मोठा दिलासा मिळणार आहे. टेम्पो ट्रान्सपोर्टचे सुद्धा पैसे निघत नाहीत म्हणून अनेकदा हे शेतकरी आपला बहुमूल्य माल वैतागून रस्त्यावर फेकून देतात. यावर आपणहि दुःखी होतो. प्रसंगी याच शेतकऱ्यावर आपल्यापैकी काहीजण चिडतात सुद्धा. पण त्यांच्यावर हि वेळ का आली? हेहि विचारात घेतले पाहिजे.
– – आणि या पार्श्वभूमीवर महेश आठवले सारखा उच्चशिक्षित (घरचा व्यवस्थित सेटल असलेला) माणूस रासायनिक खतांनी भरलेल्या भाज्या – धान्य नाकारून समाजासाठी आणि पुढच्या पिढीसाठी स्वतःच्या शेतात फक्त नैसर्गिक खत वापरून उत्तम शेतमाल पिकवतोय. होलसेल भाजीबाजारात होणारी शेतकऱ्यांची लूटमार पाहून निराश न होता हा अवलिया आता चक्क स्वतःच घराघरात हे सगळं कस पोहोच करता येईल? या विचाराने पछाडला आहे. मानले या बाबाला.
यांची माझी ओळख अशीच इथे फेसबुक वर झालेली. नंतर माझ्यातील चौकस बुद्धीने सगळं जाणून घेतलं आणि जाणवलं कि… “नाही यार, याच्या पाठीशी राहण्याची गरज आहे. “
कारण मी देखील स्वतः शेतकरी. माझे आई वडील शेतकरी. त्यांचे ते सगळे श्रम जवळून पाहिलेले. असेच श्रम करणारा हा महेश! आजही इतकं लढताना काहीवेळा हे सगळं बाजारातील रासायनिक भाज्यांचा डोंगर पाहून निराश होतो, तर कधी मित्रांकडून आग्रहाने यांच्याकडील भाज्यांची किंवा रसायनमुक्त गव्हाची ऑर्डर येते तेव्हा आनंदून जातो.
पुण्यातील ग्राहक पेठेचे सूर्यकांत पाठक यांच्याशी माझी खूप जुनी मैत्री… तर मला वाटलं की तिथं या महेशचे धान्य ठेवले जावे. (तिथं व्हेंडरसाठी खूप काटेकोर निकष आहेत) पण तरी मी त्यांना फोन करून सर्व काही सांगितलं आणि त्यांनीही “पाठवून द्या त्यांना, पाहतो काय करता येईल ते” असा प्रतिसाद दिला.
ग्राहकपेठे सारख्या काटेकोर दर्जा तपासणाऱ्या मॉलमध्ये जिथे यांचा पहिल्या वर्षी तीन चारशे किलो गहू गेला तिथे दुसऱ्याच वर्षी १४०० किलोची विक्री ओलांडली आहे. यातच सगळं आलं.
या त्यांच्या चळवळीला आता यंदा दहा वर्ष पूर्ण होतील.
इतकी वर्ष सलग हे तप करणे सोपे नाही, जे महेशने शक्य करून दाखवलं आहे.
डॉ. डीडी क्लास : स्वतःसाठी जगणं, हि प्रकृती असते मात्र इतरांसाठी काहीतरी करत करत जगणं हि खरी आपली संस्कृती. ती जपणाऱ्या या अवलियाला वाकून सलाम. विशेष म्हणजे समाजाला रसायनमुक्त भाज्या / धान्य मिळणं, हा त्यांचा हक्क आहे आणि त्यांना तो मिळवून देण्यासाठी सर्वस्व पणाला मी लावेल, असे म्हणणारा हा महेश नावाचा आधुनिक भगीरथ, खरेच ग्रेट.
माझ्या जीवनात अनेक असे अवलिया आले म्हणूनच माझाही प्रवास सुखाचा झाला. म्हणूनच त्या अशा अवलियांची ओळख तुम्हाला करून देणं, हे माझंही कर्तव्य आहे. असं मला वाटत. काळाची गरज असलेलं काम करणाऱ्याला आता समाजानेही पाठबळ देण्याची गरज आहे. तरच असे मग हळूहळू सर्वत्र इतर अनेक महेश आठवले प्रोत्साहित होऊन समाजाला सकस धान्य /भाज्या देतील!
(आणि हो.. किमान जमल्यास ही पोस्ट शेयर केली तरी बरेच मोठे काम होईल.)
कार्तिक शुक्ल पंचमीला पांडव पंचमी, कड पंचमी, लाभ पंचमी, जया पंचमी, ज्ञान पंचमी अशा विविध नावांनी ओळखले जाते. याच दिवशी शिखांचे दशम व अखेरचे धर्मगुरु ‘श्री गुरु गोविंदसिंह महाराज’ यांची जयंती असते.
द्यूतात कौरवांकडून पराजित झालेल्या पांडवांना क्रीडेपूर्वी मान्य केलेल्या अटींप्रमाणे बारा वर्षे वनवास व एक वर्ष अज्ञातवासात काढावी लागली. कार्तिक शुक्ल पंचमीला पांडव अज्ञातवासातून प्रकट झाले. म्हणून ही ‘पांडव’ पंचमी!
कार्तिक शुक्ल पंचमीला पांडवांचे स्मरण केले जाते. महायुद्धात विजयी झालेल्या पांडवांची पूजा देशभर केली जाते. असे करण्यामागे पांडवांच्या अंगी असलेले अतुलनीय शौर्य, धैर्य, वीर्य, पराक्रम अशा अनेक उच्च आदर्श गुणांचे पूजन करण्याची ही परंपरा आहे.
संपूर्ण देशभरात, देशातील घराघरात पांडवांसारखे पुत्र जन्माला यावेत, पांडवांचे गुण, शौर्य, विरता, हार न मानण्याची दृढइच्छाशक्ती आपल्या अपत्यात यावी, यासाठी पांडवांची पूजा मोठ्या भक्तीभावाने करण्याची ही परंपरा प्रचलित आहे.
कृष्णविना पांडव अपूर्ण आहेत म्हणून यावेळी पांडवांसमवेत श्रीकृष्णाचे पूजनही आवर्जून केले जाते. या दिवशी श्रीकृष्णाच्या नामाचा अधिकाधिक जप करावा, असे सांगितले आहे. या दिवशी गोमयापासून पांडव व श्रीकृष्ण यांच्या प्रतिमा सिद्ध करतात आणि त्यांची पूजा करतात.
पांडव पंचमीची कथा
कार्तिक शुक्ल पंचमीला पांडवांनी महाभारत युद्धात जय मिळविला असे एका कथेत सांगितले जाते तर आणखी एका कथेनुसार पाचही पांडव एक एक करून कार्तिक शुक्ल पंचमीलाच पृथ्वीवरती अवतीर्ण झाले! कुंतीला दुर्वासांनी दिलेल्या मंत्राच्या योगाने कौमायवस्थेत सूर्याच्या प्रसादाने प्राप्त झालेल्या कर्णाला पांडव मानले जात नाही. पंडूशी विवाह झाल्यानंतर आपला पती ऋषींच्या शापामुळे पुत्र उत्पन्न करण्यास असमर्थ असल्याचे लक्षात आल्यानंतर सर्वात प्रथम कुंतीने यमराजाचे /धर्मराजाचे आवाहन या कार्तिक शुद्ध पंचमीला केले. त्याच्या प्रसादाने युधिष्ठिर म्हणजे धर्मराजाचा जन्म झाला. पुढच्या वर्षी कार्तिक शुक्ल पंचमी याच दिवशी वायु देवाच्या प्रसादाने भीमसेन, त्यानंतर इंद्राच्या प्रसादाने अर्जुन जन्मला. असे तीन तेजस्वी पुत्र प्राप्त केल्यानंतर कुंतीने हा मंत्र पंडूची द्वितिय पत्नी, आपली सवत, माद्रीला दिला. त्या मंत्राने माद्रीला अश्विनी कुमारांच्या कृपेने नकुल व सहदेव प्राप्त झाले. अशारीतीने सर्व पांडवांचे आगमन हे कार्तिक शुक्ल पंचमीला झाल्यामुळे या दिवसाला ‘ पांडव पंचमी ‘ असे म्हटले जाते.
याखेरीज महाभारतात झालेल्या कौरव आणि पांडवांच्या घनघोर युद्धात पांडवांनी कार्तिक पंचमीलाच विजयश्री मिळविली असेही म्हटले जाते.
पांडव पंचमी कुठे आणि कशी साजरी केली जाते ?
विविध प्रांतात विविध पद्धतीने पांडव पंचमी साजरी केली जाते, पांडवांची पूजा केली जाते. या पूजापद्धतीत प्रांतपरत्वे काही भेद असतीलही पण भारतभर पांडव पंचमीचा उत्सव साजरा केला जातो.
महाराष्ट्रात हा दिवस ‘पांडव पंचमी’ किंवा ‘कड पंचमी’ म्हणून साजरा केला जातो. या दिवशी इलेक्ट्रिशियन, कापड व्यापारी, हलवाई, मिठाई विक्रेते हा व्यापारी वर्ग दिवाळी सारखीच पूजा करतो.
गुजरातमध्ये हा दिवस दिवाळीचा अंतीम दिवस म्हणून अत्यंत थाटामाटात साजरा केला जातो. तेथे या पंचमीला ‘लाभ पंचमी’ म्हणून ओळखले जाते. यादिवशी गुजराती समाज श्री गणेश – लक्ष्मी यांचे पूजन करतो. दिवाळीला केल्या जाणाऱ्या पूजेसारखेच यालाही महत्व असते.
छत्तीसगड च्या बिजापूर जिल्ह्याचे पुजारी ‘कांकेर’ गावात आजही पांडवांची पूजा करतात. येथे दर दोन वर्षांनी मोठी यात्रा भरते. कौरावांकडून सर्व काही हिरावून घेतल्यानंतर पांडव दंडकारण्यात काही काळासाठी वास्तव्यास होते. अज्ञातवासात त्यांनी या भागात आश्रय घेतला होता. म्हणून या डोंगराचे नाव ‘ पांडव पर्वत ‘ पडले आहे.
उत्तर भारतात या दिवशी घर गोमयाने सारवून, गोमयाच्या पांडव आणि श्रीकृष्ण यांच्या प्रतिमा करून त्यांची पूजा केली जाते.
जैन धर्मात या पंचमीला ‘ ज्ञान पंचमी ‘, ‘ सौभाग्य पंचमी ‘ म्हणून ओळखले जाते. ज्ञान पंचमीला जैन समाज धर्मीय ज्ञान आणि पवित्र ग्रंथ यांचा सन्मान करतात. त्यांच्यासाठी हा दिवस विद्यार्थी, विद्वान आणि सर्वांसाठी ज्ञान, दिव्य किंवा पारलौकिक ज्ञान, बुद्धिमत्ता याचा आदर करण्याचा, याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस असतो. हा शुद्ध ज्ञानाच्या पूजेचा दिवस आहे.
ज्ञान म्हणजे आंतरिक आत्म्याचा प्रकाश! हा एक प्राकृतिक प्रकाश आहे. ज्ञान जीवनाची एक तेजस्वी, निर्मल, उज्ज्वल ज्योती आहे. या ज्योतीच्या दिव्य प्रकाशाभावी आम्ही काहीच बघू शकत नाही, जाणू शकत नाही. सत्य आणि असत्य यातील भेद समजू शकत नाही. यालाच ज्ञानाचा प्रकाश देणारा ‘ द्वितिय सूर्य ‘ किवा ‘ तृतिय नेत्र ‘ म्हणतात. ज्ञानाची पूजा करण्याचा जैनांचा हा दिवस कार्तिक शुक्ल पंचमी म्हणजे ‘ ज्ञान पंचमी ‘
शीख धर्मीय हा दिवस श्री गुरु गोविंदसिंह जयंती म्हणून साजरी करतात. शिखांचे दहावे व अखेरचे गुरु श्री गुरु गोविंदसिंह याच पवित्र दिनी जन्मले.
मुस्लिम समाजात सुद्धा सुफी परंपरेमध्ये ही कार्तिकातली शुक्ल पंचमी साजरी केली जाते. दिल्लीत हजरत निजामुद्दीन अवलियाच्या दर्ग्यावर, त्यांचा सर्वोत्तम शिष्य अमीर खुसरो, याने ही प्रथा चालू केली. त्या दिवशी सर्व मुस्लीम पिवळ्या रंगाच्या पगड्या बांधून दर्ग्यावर पिवळी चादर चढवतात.
पाकिस्तानातही ही पंचमी आणि वसंत पंचमी मुस्लिम समाजातील सुफी संप्रदाय साजरी करतो.
पंचमी ही पूर्ण तिथी
एकूणच हिंदुधर्मात पंचमी ही तिथी खरंच खूप महत्वाची आहे. ज्योतिष शास्त्रानुसार पंचमी तिथी ही पूर्ण तिथी आहे. प्रत्येक महिन्याच्या शुक्ल व कृष्ण पंचमीला काही ना काही महत्व आहे. बघा ना, चैत्रात ‘ श्री पंचमी ‘, वैशाखात ‘ आद्य शंकराचार्य जयंती, श्रावणात ‘ नागपंचमी ‘, भाद्रपद महिन्यात ‘ ऋषिपंचमी ‘, अश्विन महिन्यात ‘ ललिता पंचमी ‘, (श्री स्वामी समर्थ या ललिता पंचमीलाच अक्कलकोटात प्रकट झाले / प्रवेश करते झाले. ) कार्तिक महिन्यात ‘ पांडव पंचमी ‘, माघ महिन्यात ‘ वसंत पंचमी ‘. ही पंचमी सरस्वती पूजनाकरिता अतिशय विशेष मानली गेली आहे. फाल्गुन मासातील वद्य पंचमी म्हणजे ‘ रंगपंचमी’.
अशा या पौराणिक, ऐतिहासिक, ज्ञान, ज्योतिषशास्त्र व सांस्कृतिक दृष्टया महत्वाच्या पांडव पंचमीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा !
☆ भारतातील ज्येष्ठ नागरिकांची सद्यपरिस्थिती.– लेखक : श्री राजीव शास्त्री ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆
ज्येष्ठ नागरिकांच्या सामाजिक समस्यांचे सर्वेक्षण करत असताना बऱ्याच ज्येष्ठ नागरिकांशी संवाद झाला. त्यांच्याशी बोलताना त्या समस्यांचे त्यांचे मूळ कारण कुठेतरी आर्थिक परिस्थितीशी निगडित असल्याचे प्रकर्षाने जाणवले. आर्थिक परिस्थिती सक्षम नसल्याने वयोमानाप्रमाणे आवश्यक असलेल्या सुविधांचा ते वापर करू शकत नाहीत, तणावमुक्त राहू शकत नाहीत आणि म्हणून कदाचित ते समाजात वावरताना येणाऱ्या अपरिहार्य अडचणींचा सामना करायला कमी पडतं असावेत हे लक्षात आले.
गेल्या काही वर्षांपासून आवश्यक त्या आरोग्यसेवा उपलब्ध होऊ लागल्याने संपूर्ण जगातील नागरिकांचे आयुष्यमान वाढू लागले आहे आणि अर्थातच आपला भारत देश त्याला अपवाद नाही. भारतातील ज्येष्ठ नागरिकांची संख्या जाणवण्याइतकी वाढत चालली आहे. वर्ष २०११नंतर जनगणना झाली नसली तरी उपलब्ध माहितीनुसार आज मितीला भारतामधील जेष्ठ नागरिकांची संख्या साधारणपणे १५ ते१७ कोटी आहे. हि संख्या एकूण लोकसंख्येचा विचार करताना दखलपात्र असल्याने त्याचा स्वतंत्रपणे सखोल अभ्यास आणि राज्यकर्त्यांबरोबर समाजाकडूनही सहानुभूतीपूर्ण विचार होणे गरजेचे आहे.
ज्येष्ठ नागरिकांसाठी भारतामध्ये केंद्र सरकारकडून आणि महाराष्ट्रासह बहुतेक राज्य सरकारांकडून बऱ्याच चांगल्या योजना राबविल्या जातात. त्याच्यामध्ये प्रामुख्याने वरिष्ठ नागरिक कल्याण कार्यक्रम (IPSrC) (बिनसरकारी संस्थांना आर्थिक मदत, डिमेंशिया आणि अल्झायमर सारख्या आजारी व्यक्तींकरिता कायमस्वरूपी मदत केंद्र आणि दुर्गम भागात मोबाईल वैद्यकीय मदत), राष्ट्रीय सामाजिक सहाय्यता कार्यक्रम (NSAP), (दारिद्रय रेषेखालील जेष्ठ नागरिकांसाठी इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्ध निवृत्तीवेतन योजना(IGNOAPS), राष्ट्रीय वयोश्री योजना (RVY) (ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत श्रवण यंत्र, व्हील चेअर वगैरे), वरिष्ठ पेन्शन विमा योजना (एक रकमी गुंतवणूक करू शकणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांसाठी निवृत्तीवेतन), वरिष्ठ नागरिक कल्याण निधी (SCWF) (अर्थ संस्थांकडे न मागितल्या गेलेल्या रकमेचा ज्येष्ठ नागरिकांसाठी विनियोग), माता-पिता आणि वरिष्ठ नागरिकांसाठी भरणपोषण आणि कल्याण अधिनियम २००७ वृद्ध पालकांची जबाबदारी टाळणाऱ्या पाल्यांसाठी कायदेशीर मदतकेंद्र आणि अशा ज्येष्ठ नागरिकांसाठी प्रत्येक जिल्ह्यात वृद्धाश्रम किंवा तत्सम सोय), तसेच करांमध्ये सवलत अशा प्रकारच्या आहेत. ह्याच्या व्यतिरिक्त रेल्वे, विमान प्रवासात सवलत, हॉस्पिटलमध्ये प्राधान्यक्रम, शहरी भागात विरंगुळा केंद्र, डे केअर सेंटर सारख्या सुविधा, डिजिटल साक्षरता आणि गुंतवणुकीसंबंधी मार्गदर्शन अशाही सुविधा उपलब्ध आहेत.
अमेरिका किंवा युरोपियन देशांमध्ये साधारणपणे अशाच धर्तीवर सुविधा मिळतात. भारतासारखा एक मोठा लोकशाही असलेला देश म्हणजे अमेरिका. अमेरिकेमध्ये ६५ वर्षांवरील व्यक्ती ज्येष्ठ नागरिक समजली जाते. आपल्याकडे निवृत्तीवेतन दिले जाते तसे देण्यासाठी तिकडे Social Security Number (SSN) अशी एक संकल्पना आहे. हा ९ आकडी क्रमांक अमेरिकेत जन्मलेल्या प्रत्येकाला जन्मतः मिळतो आणि देशाबाहेरून आलेल्या कर्मचाऱ्यांना नोकरीच्या पहिल्या दिवसापासून दिला जातो. त्या व्यक्तीच्या पगारातील काही रक्कम त्या नंबरच्या खात्यात वर्ग केली जाते. सरकारकडूनही त्या प्रमाणात त्या खात्यात पैसे जमा केले जातात. आणि हे साठलेले पैसे निवृत्तीवेतनासाठी आवश्यक असलेला नोकरीचा कालखंड पूर्ण झाल्यावर त्या व्यक्तीला दरमहा दिले जातात. मिळालेल्या माहितीनुसार खाजगी, सरकारी असा भेदभाव न करता, कोणत्याही क्षेत्रात आणि कोणत्याही पदावर कार्यरत असलेली अमेरिकन नागरिक व्यक्ती ह्या सेवेचा लाभ घेऊ शकते.
फरक करायचा झाला तर भारतात पुरेसे निवृत्तीवेतन फक्त केंद्र/राज्य सेवेतील कर्मचाऱ्यांना किंवा Employees’ Provident Fund Organisation (EPFO). अंतर्गत येणाऱ्या संस्थांच्या कर्मचाऱ्यांना मिळते. खाजगी क्षेत्रातील विशेषतः तृतीय, चतुर्थ श्रेणीमधील कर्मचाऱ्यांची किंवा छोट्या व्यावसायिकांकडे काम करणाऱ्यांकरीता अशी कोणतीही व्यवस्था नाही. भविष्य निर्वाह निधी म्हणून मिळालेली एकरकमी रक्कम कशाही प्रकारे गुंतविली तरी वयाची सत्तरी आली कि महागाईच्या हिशोबाने अपूरी पडायला लागते. खरं तर त्या वयापासून त्यांची आर्थिक गरज वाढत जाणार असते. अमेरिकेतील राजकीय आणि सामाजिक परिस्थिती जरी आपल्याकडील परिस्थितीपेक्षा भिन्न असली तरी संख्यात्मक दृष्ट्या तिथे निवृत्तीवेतन हे जास्त गरजू नागरिकांपर्यंत पोहोचते असे नक्की म्हणता येईल.
अमेरिकेमध्ये तिथल्या दारिद्रय रेषेच्या नियमाप्रमाणे ९२लाखांपेक्षा जास्त ज्येष्ठ नागरिक गरीब आहेत. त्यांच्याकरिता तिथे किमान आवश्यक गृह, आरोग्य आणि भोजन सारख्या व्यवस्था मोफत उपलब्ध आहेत. UNFPA and NITI Ayog च्या अहवालातून उपलब्ध माहितीनुसार भारतामधील सध्याची ज्येष्ठ नागरिकांची संख्या अंदाजे १७ कोटी आहे. त्यांच्यापैकी ४०% नागरिक हे गरीब श्रेणीतील आहेत तर १८. ७. % जेष्ठ कोणतेही उत्पन्न नसलेले आहेत. म्हणजे भारतातील साधारणपणे ६०% ज्येष्ठ नागरिक आर्थिक दृष्ट्या दुर्बल आहेत असे म्हणता येईल. ह्या विषयावर निवारा वृद्धाभ्यास केंद्र, पुणे येथे जास्तीचा अभ्यास केला जात आहे. अशा नागरिकांसाठी आपल्याकडेही बऱ्याच सरकारी योजना आहेत. पण कुठेतरी त्या अपुऱ्या पडत आहेत किंवा योग्य त्या व्यक्तींपर्यंत पोहोचत नसाव्यात असे चित्र दिसते. उदाहरण द्यायचे झाले तर पुण्यासारख्या शहरातील काही नावाजलेल्या हॉस्पिटलांमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेले आयुष्यमान कार्ड स्वीकारले जात नाही.
दुसरा एक अत्यंत महत्वाचा मुद्दा म्हणजे ज्येष्ठ नागरिकांवर परावलंबित्व आणणारे अल्झायमर किंवा डिमेन्शियासारखे आजार. भारतामध्ये डायबिटीस किंवा हार्ट ऍटकसारख्या आजारांचा आणि त्याच्यावरील उपचारांचा जेवढा विचार केला जातो तेवढा इतर आजारांचा विचार केला जात नाही. ज्येष्ठ नागरिक स्वतःही हे इतर आजार फारसे गांभीर्याने घेत नाहीत. कदाचित अशा रुग्णांची संख्या जास्त असल्याने असेल परंतू अमेरिकेमध्ये अशा आजारांचा प्राधान्याने विचार केला जातो. अशा ज्येष्ठ नागरिकांना वृद्धाश्रमांमध्ये प्राधान्य दिले जाते आणि आवश्यकतेप्रमाणे सरकारी मदत दिली जाते. पुढील काळात भारतासारख्या देशात ज्येष्ठ नागरिकांच्या वाढत जाणाऱ्या संख्येचा विचार करून अशा प्रकारच्या आजारांवर सरकारकडून अधिक प्रमाणात ठोस उपाय योजना आवश्यक आहेत. अशा रुग्णांना घरी सांभाळणे किंवा त्यांनी स्वतंत्र रहाणे हे अतिशय अवघड असल्याने त्यांची देखभाल करण्यासाठी सेवाभावी वृद्धाश्रमांसारखी स्वतंत्र व्यवस्था जरुरीची असते. सेवाभावी सामाजिक संस्थांचा सहभागही खूप उपयुक्त ठरणार आहे. फक्त व्यावसायिक नव्हे तर सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून वृध्दाश्रमांचा विचार व्हायला पाहिजे.
आजच्या घडीला संपूर्ण जगामध्ये स्वीडनमधील ज्येष्ठ नागरिक सर्वात चांगले निवृत्त आयुष्य व्यतीत करतात. आशिया खंडामधील जपान आणि दक्षिण कोरियामधील स्थिती समाधानकारक आहे. ह्या देशांमधील नागरिकांचे आयुष्यमानही जास्त आहे. हे देश भारतापेक्षा लोकसंख्या आणि इतर दृष्टींनी खूपच लहान आहेत हे मान्य करूनही तिथल्या व्यवस्था/उपक्रम समजून घेऊन आपल्याकडील त्रुटी काही प्रमाणात कमी करता येतील. विशेषतः ग्रामीण भागातील ज्येष्ठांच्या समस्यांकडे लक्ष द्यावे लागेल.
जागतिक स्तरावर आपला भारत देश सर्व क्षेत्रात प्रगतीपथावर असताना, एक मोठा शक्तिशाली देश म्हणून पुढे येत असताना ज्येष्ठ नागरिकांच्या समस्यांवर तोडगा काढला गेला, त्यांना योग्य सन्मान दिला गेला तर त्यांचे प्रदीर्घ अनुभव देशासाठी नक्कीच उपयुक्त ठरतील.
(लेखक लोकमान्य जेष्ठ नागरिक संघाचे सभासद असून निवारा वृद्धाभ्यास केंद्राशी संलग्न आहेत)
☆
लेखक : श्री राजीव शास्त्री
प्रस्तुती – श्री सुनीत मुळे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈