मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “मरणाच्या अंधारावर चालून गेलेले पाच शौर्यसूर्य!” ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

☆ “मरणाच्या अंधारावर चालून गेलेले पाच शौर्यसूर्य!” ☆ श्री संभाजी बबन गायके

— Unforgettable Forgotten Heroes of Indian Army!

मेजर संजय चौहान मैत्रिणीच्या घरी जाऊन, तिच्याशी लग्न करण्यासाठी तिच्या वडिलांशी बोलणी करायची आहेत या कारणासाठी विशेष सुट्टी मागितली आणि अशा मंगल मोहिमेसाठी वरिष्ठांनी ती मंजूरही केली! मेजर संजय चौहान कोणतीही मोहीम कमीत कमी वेळ आणि मनुष्यबळ वापरून मोहिमा फत्ते करण्यात वाकबगार होते! पठ्ठ्या एकटाच तिच्या घरी धडकणार आणि तिच्या वडिलांकडून होकार मिळवूनच येणार, याची १६, राजपुताना रायफल्स मधील त्याच्या मित्रांना खात्रीच होती!

मेजर संजय चौहान गावी जाण्यासाठी सामानाची ट्रंक भरायच्या तयारीत असतानाच त्यांनी पेरलेल्या खबरी नेटवर्क मधून पक्की खबर आली…..

काश्मीर मधल्या लछिमपोरा गावाजवळच्या वारिबन जंगलात २८ ऑक्टोबर रोजी रात्री स्थानिक, पाकिस्तानी आणि अफगाणी अतिरेक्यांची एक मोठी आणि महत्त्वाची बैठक होणार आहे!

एकाच दगडात अनेक गिधाडं टिपण्याची नामी संधी आहे, असा विचार मेजर साहेबांनी केला नसता तरच नवल!

मेजर संजय चौहान.. वय वर्षे अवघं सत्तावीस. पण अनुभव जणू दुप्पट वर्षांचा.

अतिरेकी असल्याची खबर आली की यांच्या जणू अंगात येई! ही खबर तर खूपच मोठी होती. आग्या मधमाशांचं भलं मोठं पोळंच जणू.. भारताला डसणाऱ्या काळया माशा ह्या… माशा घोंगावत उठायच्या आत पोळं खालून पेटवायची संधी सोडायला नको.. मेजर साहेबांनी ठरवलं!

ट्रंक भरली होती ती पुन्हा रिकामी केली. साहेबांपुढे जाऊन उभे राहिले. योजना आखली गेली. साहेबांना यांची कार्यपद्धती पक्की ठाऊक होती. मेजर साहेब अगदी मोजकेच सैनिक सोबत नेत.. सर्वजण बहुतेक वेळा अतिरेक्यांच्या वेषात…. धोका असेल तर मेजर साहेब स्वतः आधी पुढे जाणार… आणि विजयी होऊनच परतणार.. असा लौकिक त्यांनी मिळवला होता.

तरणेबांड सेकंड लेफ्टनंट अनिल यादव, दलबीर सिंग, कृष्ण कुमार आणि गिरीश सिंग हे तीन रायफलमेन… एकूण पाच… इतकीच टीम. रायफल्सना भरपूर वेळ पुरेल इतकी काडतुसे मात्र पाहिजेत.. बाकी वजन काही नको. काम झाल्यावरच जेवण.. म्हणून तेही सोबत नको असा खाक्या!

आजतर युनिफॉर्म पण नको होते. अफगाणी अतिरेकी घालतात ती पेहरन.. म्हणजे ढगळ कपडे, ते लोक बर्फात चालण्यासाठी त्यांनीच जुगाड करून स्थानिक पातळीवर बनवून घेतलेले शूज घालतात तसेच शूज मेजर साहेबांनी कुठून तरी पैदा करून ठेवले होतेच… ते सर्वांनी पायांत चढवले… डोक्यावर पेशावरी टोप्या, शाली.. थंडीसाठी नव्हेत… रायफल्स लपवायला.. दाढ्या तर तशाही वाढवलेल्या होत्याच… अतिरेक्यांच्या शोधात त्यांच्याच अवतारात ही मंडळी नेहमीच जंगलात जात असत!

हे निघाले… बैठक रात्री होणार… पहाटे पहाटे तिथे पोहोचायचे…. म्हणून २८ तारखेच्या रात्री चालत निघायचं.. एका ज्युनिअर कमिशन्ड ऑफिसरच्या नेतृत्वात वीस सैनिकांची एक तुकडी तेथून जवळ असलेल्या टेकडीवर थांबून गरज पडल्यास तिथून मदतीला धावणार होती.

संजय साहेबांना एरव्ही एखाद दुसरी शिकार मिळायची… आज एकाच वेळी आणि एकाच ठिकाणी शंभर किंवा किमान सत्तर ऐंशी श्वापदे मिळू शकणार होती! २९ ऑक्टोबरची पहाट सरली… थोडा उजेड झाला आणि 

हे पाच जण डोंगर उतरून अगदी सहज चालत, बोलत त्या गावात शिरले… जणू पहारा द्यायला गेलेले अतिरेकी परत येताहेत… वाटेत त्यांना अनेक गावकऱ्यांनी, आणि अजून पुरते जागे न झालेल्या अतिरेक्यांनी अफगाणी पद्धतीने अभिवादनही केले.. यांनीही त्याच भाषेत त्यांना प्रतिसादही दिला! गरजेपुरते काही पुश्तू अफगाणी शब्द यांनी शिकून घेतले होते… आणि तसा हेल काढून बोलायचा सरावही त्यांनी करून ठेवला होता!

पण शेवटी अफगाण्यांना शंका आलीच… हे पाच आपल्यातले नाहीत.. हे त्यांच्या बोलण्याच्या, वावरण्याच्या ढंगामुळे अतिरेक्यांच्या ध्यानात आले… त्यांनी यांच्यावर रायफल्स रोखल्या… आता थांबून उपयोग नव्हता… या पाच वीरांनी… राजा रामचंद्र की जय! असा घोष केला… रावणाच्या लंकेत शिरलेले हनुमान आणि वानर यांनी असाच घोष केला असेल… राजपुताना रायफल्सची ही युद्धगर्जना…. मेजर संजय चौहान यांनी फायर आदेश दिला… शाली बाजूला सारल्या गेल्या… पाच एके ४७ धडाडल्या… १७ अतिरेकी यमसदनी गेले… दोघे जायबंदी झाले. उरलेले ८१ आधी घाबरून इतस्ततः पांगले… पण पुढे जाऊन पुन्हा एकत्र आले… हे कौरव पुढे सरसावले… आपले हे पाच पांडव तिथून निसटले.. त्यात मेजर संजय क्रॉसकंट्री धावण्यात चॅम्पियन होते… हिमाचली शरीर पहाड चढण्यासाठीच मूळचे बनलेले होते… त्यांनी आणि त्यांच्या चार सहकाऱ्यांनी पळत एक छोटी टेकडी गाठली… पुन्हा एकत्रित झालेल्या अतिरेक्यांनी त्यांच्यावर चारही बाजूंनी फायरिंग सुरू केले.. मेजर संजय साहेबांनी जे. सी. ओ. ला मदतीसाठी यावे म्हणून वायरलेस कॉल लावला… पण दुर्दैवाने संभाषण होऊ शकले नाही….. प्रचंड गोळीबार सुरु होताच…. शेवटी इकडे या पाच बहाद्दर सैनिकांच्या गोळ्या संपल्या… पण त्या आधी त्यांनी आणखी सात अतिरेकी टिपले होते… ज्यांचे मृतदेह नंतर आपल्या बचाव पथकाला जंगलात आढळून आले!

आपली बचाव तुकडी पोहोचत होतीच… वरिष्ठांनी आणखी मोठी कुमक धाडली… पण उशीर झाला… अतिरेक्यांनी या पाचही जणांना जिवंत पकडण्यात यश मिळवले… पण झालेल्या प्रत्यक्ष झटापटीत या वीरांनी त्यांचे दोन चार खलास केलेच!

पण… अतिरेक्यांनी त्यांच्या पाशवी परंपरेला जागणं सोडलं नाही! या पाचही सैनिकांच्या हातापायांच्या बोटांची नखं उपसली, डोळे काढले, हात कोपरापासून छाटले…… मरण कणकण आणि क्षण क्षण… या गतीने आले असेल! देशासाठी एवढ्या वेदना सहन करतात सैनिक… आपण फक्त आणि फक्त कल्पना करू शकू!

काही वेळाने कुमक पोहोचू शकली… भारतीय सैन्य पाहून अतिरेकी जंगलात पळाले… त्या टेकडीवर त्या ठिकाणी पाच भारतीय देह निश्चल पडलेले… रक्ताचे थारोळे.. तोडून फेकले गेलेले हात… रक्ताच्या थारोळ्यात आभाळातल्या चांदण्यांचे प्रतिबिंब… पाच तारे! अतिरेक्यांच्या वेषात भारताचे शूर सैनिक मरणाच्या नाट्यात आपापल्या भूमिका वठवून काळाच्या पडद्याआड निघून गेले होते!

२९ ऑक्टोबर, १९९४. काश्मीर… भारताचे अभिन्न अंग… राखण्यासाठी अमानुष वेदना सोसून झालेली बलिदाने… माहीत नसतात आपल्याला… माहीत असलेली बलिदाने स्मरणात ठेवली

जात नाहीत. फेसबुक पेजेस आहेत हल्ली.. इंग्लिशमध्ये असते माहिती.. त्रोटक स्वरूपात.

वीर भोग्या वसुंधरा असे राजपुताना रायफल्सचे ब्रीदवाक्य आहे… सैनिक लढून जिवंत राहिले तर पृथ्वी भोगतात.. आणि धारातीर्थी पडले तर त्यांना स्वर्ग प्राप्त होतो.. असे म्हणतात. पण यांच्या बलिदानाने खरे तर सामान्य नागरिकच पृथ्वी भोगू शकतात.. हे निश्चित!

देशाने हुतात्मा मेजर संजय चौहान यांना मरणोत्तर शौर्य चक्र दिले…

संजय चौहान… हिमाचल प्रदेश मधील सोलन गावात जन्मलेला वीर. शिकायला बाहेर पडला.. शहरात आला… एकदा गावी जाण्यासाठी जालंधर स्टेशनवर उभा होता.. समोरच्या प्लॅटफॉर्मवर लष्करी जवानांना, अधिकाऱ्यांना घेऊन जाणारी ट्रेन थांबलेली… दरवाजात कुणी लष्करी अधिकारी उभे दिसले… रुबाबदार व्यक्तिमत्व.. चमकदार युनिफॉर्म! उंचापुरा संजय थेट त्यांना भेटला.. मला मिळेल का असा युनिफॉर्म? काय करावं लागतं यासाठी? त्याने विचारले. साहेब म्हणाले “युनिफॉर्म मिळत नाही… कमवावा लागतो! “

संजय यांच्या कुटुंबातील कुणीही लष्करात नव्हतं.. मित्रही नव्हता कुणी फौजेत.

पुढे एम. एस्सी. करण्यासाठी अलिगढ विद्यापीठात शहरात शिष्यवृत्ती मिळाली.. तिथे जाऊन आय. एम. ए. Indian Military Academy ची वाट गवसली. अभ्यास आणि खेळ अवगत होता.. खूप मेहनत केली.. दोन लाखातून दीडशे निवडले गेले… त्यात संजय चौहान होते… academy मध्ये प्रशिक्षणासाठी ‘इंफाळ’ नावाच्या कंपनीत निवडले गेले… आडनाव चौहान म्हणून सोबत्यांनी ‘चऊ’ टोपणनाव दिले! Gentleman Cadet संजय चौहान ट्रेनिंगमध्ये अव्वल ठरले. राजपुताना रायफल्स… शौर्यासाठी प्रसिद्ध. Rajrif नावाने प्रसिध्द असलेल्या या दलात १४ डिसेंबर, १९९१ रोजी संजय चौहान साहेब अधिकारी म्हणून दाखल झाले. नंतर पुढे राजस्थानमध्ये लालगढ जट्टान येथे नेमणूक झाली.. त्यांचे युद्ध कौशल्य पाहून वरिष्ठांनी घातक प्लाटूनचे कमांडर बनवले!

जून १९९३ मध्ये राजपुताना रायफल्स काश्मीर खोऱ्यात गेली.

घातक कमांडर म्हणून अनुभव असल्याने संजय साहेबांनी स्थानिक जनतेत खबऱ्यांचे जाळे विणले.

एकाच ठिकाणी सुमारे १०० अतिरेकी येणार असल्याची खबर त्यांनाच लागली! एकाच फटक्यात यातले निम्मे जरी मारले तरी धरणीचा भार तेवढाच हलका होईल! म्हणूनच मेजर संजय चौहान यांनी हे प्रचंड धाडस केले!

Unforgettable Forgotten Heroes मधील हे एक मोठे हिरो.. त्यांचे स्मारक आहे हिमाचल मध्ये.. पण…. हिमाचल वगळता देशाला फारसे माहित नाहीत! अधिकाऱ्यांची माहिती तरी बऱ्यापैकी असते.. पण जवानांची नावं अज्ञात राहतात! लेफ्ट. कर्नल जे. एस. सोधी यांच्यासारखे माजी सैन्याधिकारी इंग्रजीत लिहित असतात. हिरोज इन युनिफॉर्म सारखी शेकडो पेजेस आहेत. मी यांतून आणि अनेक बातम्या, व्हिडिओज मधून माहिती घेतो आणि केवळ कॉपी पेस्ट करत असतो. मेजर संजय चौहान साहेब, त्यांचे या मोहिमेतील सहकारी युवा सेकंड लेफ्टनंट अनिल यादव, रायफलमेन दलबीर सिंग, कृष्णन कुमार आणि गिरीश सिंग यांना भावपूर्ण श्रद्धांजली! जय हिंद!

ही शौर्यगाथा किमान एका व्यक्तीला ऐकवा… पाठवा!

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “चौथं माकड…” ☆ श्री मंगेश मधुकर ☆

श्री मंगेश मधुकर

? इंद्रधनुष्य ?

☆ “चौथं माकड…” ☆ श्री मंगेश मधुकर

माकड म्हटलं की भिरभिरत्या नजरेन बघणारं, एकाजागी स्थिर नसणारं, दात विचकवणारं, अंगावर धावून येणारं, हातातल्या वस्तू ओढणारं…… हेच चित्र डोळ्यासमोर येतं 

अर्थात फक्त माकडचं नाही तर काही माणसं सुद्धा असचं वागतात यात नवल नाही.. पूर्वजांचे थोडेफार गुण असणारच ना… असो, , ,

आजचा विषय वेगळा आहे.

“ वाईट बोलू नये.. वाईट ऐकू नये.. वाईट पाहू नये “ – – – 

कान, तोंड आणि डोळ्यावर हात ठेवून हा संदेश देणारी माकडं सर्वांना माहिती आहेत. अनेक वर्षे तिघंच होते… 

…. परंतु आता त्यांच्यात ‘चौथा’ आलाय.

काळानुसार जगण्यात नवनवीन गोष्टी येत राहतात. तसंच हे चौथ्याचं येणं.

याची स्पेशालिटी म्हणजे हा कोणता संदेश देत नाही. कायम आपल्याच तंद्रीत, तहान-भूक विसरून 

एका जागी कितीही वेळ बसू शकतो.

…. एकटचं हसणं, तुटक तुटक वागणं, गप्प गप्प राहणं, स्वतःशीच मोठ्यानं बोलणं.

.. दुसरं कोणी बोललं तर उत्तर मिळेल खात्री नाही… सदैव मान खाली, नजर झुकलेली, अजिबात इकडं तिकडं पाहणं नाही. डिस्टर्ब केलेलं आवडत नाही. विनाकारण चिडणं, खेकसणं सुरु असतं…. पण सगळं तात्पुरतं… लगेच आपल्या जगात हरवतो.

याच्यापासून त्रास नाही, कारण तो काहीच करत नाही. त्याला शारीरिक कष्ट अजिबात नको असतात.

सगळा कल कामं टाळण्याकडे… एकदम आयतोबा!! सगळं बैठे बिठाये पाहिजे.

मात्र, तो आधुनिक आहे.. स्मार्ट आहे.. टेक्नॉसाव्ही आहे… तरीही सतत अस्वस्थ अन मन सैरभैर, चटकन निर्णय घेणं जमत नाही… ही या चौथ्याची खास वैशिष्ट्य.

.. लोकसंख्येप्रमाणे वाढणारी या चौथ्या माकडांची संख्या चर्चेचा आणि चिंतेचा विषय झालाय. याच्यावरून घराघरात वादाचं प्रमाण वाढतयं. नवीन प्रॉब्लेम्स झालेत.

घरात, रस्त्यावर, गर्दीच्या, मोकळ्याच.. या ठिकाणी हे चौथं माकड दिसतं. शारीरिक आणि मानसिक आरोग्याच्या दृष्टीनं हे धोकादायक बनलंय. प्रचंड संसर्गजन्य असलेल्या याचा वावर सर्वत्र आहे.

सध्यातरी, याच्यावर हमखास उपाय नाही. मात्र त्यासाठी ठरवून प्रयत्न केले पाहिजेत.. ही काळाची गरज.

मला काय करायचं.. माझा काही संबंध नाही.. सगळी दुनिया हेच करतेय

…. असं म्हणून जबाबदारी झटकता येणार नाही….

कारण….

कारण आता.. हे चौथं माकड जगण्याचा भाग झालंय.

त्याला कंट्रोल मध्ये ठेवा नाहीतर…….

© श्री मंगेश मधुकर

मो. 98228 50034

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ग्रंथोपचार : भावनिक सक्षमतेचा एक मार्ग… ☆ सुश्री अर्चना दादासाहेब मुळे ☆

सुश्री अर्चना दादासाहेब मुळे

 ? इंद्रधनुष्य  ?

☆ ग्रंथोपचार : भावनिक सक्षमतेचा एक मार्ग… ☆ सुश्री अर्चना दादासाहेब मुळे☆

भारताचे माजी राष्ट्रपती आणि मिसाईल मॅन डाॅ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी १५ ऑक्टोबर रोजी सर्वत्र ‘वाचन प्रेरणा दिन’ साजरा केला जातो. कलामसरांचं वाचनप्रेम सर्वश्रूत आहेच. त्यांना पुस्तकं आवडायची. त्या यादीतलं ‘लाईट फ्राॅम मेनी लॅम्प्स’ हे एक पुस्तक. ते म्हणतात, “अपयशी कथा वाचायला हव्यात. त्यातून यशस्वी होण्यासाठीच्या कल्पना सुचतात. ” त्यांचं ‘अग्निपंख’ हे पुस्तक प्रत्येकानं वाचलंच पाहिजे असं आहे. पुस्तकं फक्त आपलं आयुष्यच बदलत नाहीत तर आपल्याला मानसिक सक्षम करतात. भावनिक संतुलन शिकवतात. पुस्तकं म्हणजे कायम साथ देणारे सोबती आणि जगणं अर्थपूर्ण करणारे जवळचे मित्र. पुस्तक म्हणजे नव कल्पनांचा उद्गाता आणि प्रेरणादायी जीवनाचा मार्ग. पुस्तक म्हणजे दैनंदिन जीवनातील आव्हानांना सामोरं जाण्याची शक्ती. वाचन म्हणजे मनमोकळेपणानं भटकू शकणारं, हवं तिथं, हवं तसं रमू शकणारं, भावनांना वाहू देणारं, मनाची अनेक रहस्य उलगडणारं, मनाची हिरवळ टिकवून ठेवणारं, दैनंदिन जीवनातील छोट्या मोठ्या समस्यांची उत्तरं देणारं, आयुष्यभर शिकवणारं, वैचारिक समृद्ध करणारं, योग्य मार्गदर्शन करणारं शांत, निर्मळ, मनस्वी अशा सुंदर बागेतलं आत्मिक समाधान.

अशा बागेत फेरफटका मारल्यानं वाचकांना त्यांच्या भावना समजायला मदत होते. बहिणाबाईंच्या कवितांनी आजही समाजमन हळवं होतं. प्र. के. अत्रे, पु. ल. देशपांडे यांनी मराठी मनाला खळखळून हसवलं. नाच ग घुमा, नाॅट विदाऊट माय डाॅटर, गार्गी अजून जिवंत आहे, आत्ता अलिकडचं फिंद्री, एक भाकर तीन चुली अशा अनेक पुस्तकांनी वाचकाला रडवलं आहे. अच्युत गोडबोले यांची पुस्तकं दैनंदिन जीवनातील, समाजालाआवश्यक अशा सर्वच विषयांचं सखोल ज्ञान देतात. वाचकांचा आत्मविश्वास वाढवतात. त्यांचं ‘मुसाफिर’ पुस्तक वाचून व्यसन सोडतात. आत्महत्येपासून परावृत्त होतात. ‘गाथा स्वराज्याची – पैलू शिवचरित्राचे’ हे सदानंद कदम यांचं पुस्तक छत्रपती शिवाजी महाराजांचा आजपर्यंत फारशा माहीत नसलेला इतिहास सांगतं. ते वाचून वाचकाला एक अनोखी सकारात्मक ऊर्जा मिळते. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष विल्सन यांनी वयाची २१ वर्षे पूर्ण होण्याआधीच एक हजार पुस्तकं वाचली होती. सजग वाचकाला प्रत्येक पुस्तकातून विलक्षण जग अनुभवायला मिळतं. पुस्तकातलं एखादं पान, एखादं वाक्य माणसाला त्याच्या ध्येयापर्यंत पोहोचवतं. पुस्तकं प्रेरणा, अध्यात्माचे धडे, आंतरिक शक्तीची जाणीव, लढण्याची क्षमता, जीवनाकडं बघण्याचा नवा दृष्टिकोन देतात. मंगेश पाडगावकर म्हणतात, ‘या ग्रंथाच्या तेजामधूनी जन्मा येते क्रांती.. ग्रंथ शिकविती माणुसकी अन् ग्रंथ शिकविती शांती. ‘ 

पुस्तक वाचनाचे मेंदूवर होणारे परिणाम, मानसिक – सामाजिक परिणाम अधोरेखित करता येतील…

मेंदूवर होणारे परिणाम : मेंदूच्या डाव्या भागात टेम्पोरल काॅर्टेक्स असतं. ते भाषा आणि आकलन यासाठी महत्त्वाचं असतं. त्या भागाला वाचनानं चालना मिळते. मेंदूतील संपर्क जाळं वाढतं. विचारांची स्पष्टता वाढते. विश्लेषण कौशल्य वाढतं. शब्दसंग्रह वाढतो. मेंदूची क्षमता वाढत जाते. वाचन आपले विचार, भावना आणि धारणा यांना आकार देतं.

 मानसिक परिणाम : ताण कमी होतो. भावनिक बुद्धिमत्ता वाढते. एकाकीपणा कमी होतो. मानसिक आरोग्याचा सामना सहज करता येतो. व्यक्तिगत विकास होतो. आत्मसन्मान, आत्मजागरूगकता, कार्यक्षमता या भावना सुधारतात. सकारात्मक दृष्टिकोन विस्तारतो. वर्तनदोष सुधारते. सहानुभूती, कृतज्ञता या गुणांची वाढ होते. चांगलं आणि वाईट यातील समज वाढते. भावनिक गरजा पूर्ण होऊ शकतात. वाचनामुळं हृदयाचे ठोके कमी होतात. स्नायूंवरचा ताण कमी होतो.

सामाजिक परिणाम : पुस्तकातील पात्रांशी एकरूप व्हायला होतं. मनाशी संवाद वाढतो. त्याचबरोबर सामाजिक संवाद साधण्यात सहजता येते. नातेसंबंध सुधारू शकतात. कौटुंबिक समस्या, मित्रांची कमतरता याबाबत पुस्तकं सुरक्षितता देतात.

न्युरोसायन्स सांगतं की, वाचनामधे मेंदूचं रसायनशास्र बदलण्याची क्षमता आहे. एफएमआरआय स्कॅन केल्यानंतर असं लक्षात येतं की, ‘आत्मचरित्राचं किंवा आवडीच्या अशा पुस्तकाचं वाचन करताना मेंदूतील आनंद भावनाचं क्षेत्र उसळी मारतात. ‘ वाचन मेंदूला परिपूर्ण व्यायाम देतं. मेंदू एखादा अनुभव वाचणं आणि प्रत्यक्षात जगणं असा फरक करत नाही. वाचताना आणि प्रत्यक्ष जगताना त्याच न्युराॅलाॅजिकल क्षेत्रांना उत्तेजन मिळतं. म्हणूनच पुस्तकं वाचणं ही एक उपचारपद्धती म्हणून उदयाला आली.

दुसर्‍या महायुद्धानंतरच्या काळात मानसिक आरोग्य ही एक प्रमुख चिंता झाली होती. लोकांची मन अस्थिर झाली होती. भीती, काळजी, नैराश्य, मूड डिसऑर्डर, आघात, व्यसन, दु:ख, घटस्फोट, बिघडलेले नातेसंबंध, शारीरिक अक्षमता अशा अनेक समस्या जगासमोर आवासून उभ्या होत्या. त्यासाठी अनेक उपचार पद्धतींचा शोध या काळात लागला. त्यापैकीच एक ‘ग्रंथोपचार’ आहे. ‘ग्रंथोपचार’ हा शब्द साधारणपणे शतकापूर्वी पाद्री सॅम्युयल क्रोथर्स यांनी पहिल्यांदा वापरला असला तरी प्राचीन काळापासून हा उपचार अस्तित्वात आहे. प्राचीन ग्रीसमधील थेब्ज येथील ग्रंथालयाच्या दारावर लिहिले होते, ‘आत्म्याचे उपचार करण्याचे ठिकाण. ‘ तेथील वाचकांनी ओळखले होते की, कथा जितकं मनोरंजन करतात, माहिती देतात तितक्याच त्या सांत्त्वन आणि मार्गदर्शन ही करतात.

ग्रंथोपचार म्हणजे वाचनाद्वारे मानसिक संतुलन राखण्याची कला विकसित करणे. त्याचबरोबर भावनिक विकारांवरील उपचारपद्धती सहज आणि सुलभ करणे. एका अभ्यासात असं दिसून आलं आहे की, हृदयविकार आणि पीटीएसडीच्या रूग्णांसाठी या थेरपीचा यशस्वीपणे वापर करण्यात आला होता. कथा हा प्रकार ग्रंथोपचाराच्या पारंपरिक पद्धतीची शैली आहे. यात कविता दुसर्‍या क्रमांकावर आहे. त्यानंतर आत्मचरित्र, चरित्र, ललित, कादंबरी असे साहित्य प्रकार येतात. लहान मुलांकरीता चित्रपुस्तकं उपयुक्त ठरतात.

बिउला कांतेर एफ्राॅन यांनी ‘ इमोशनल डिफिकल्टिज इन रिडिंग: अ सायकॉलॉजिकल अप्रोच टू स्टडी प्रॉब्लेम्स’ नावाचं पुस्तक लिहिलं आहे. त्यांच्या मते, ‘मानसोपचार तज्ज्ञानी उपचारात्मक वाचन थेरपीचा वापर वाढवला पाहिजे. वाचनातील अडचणीमुळे व्यक्तिमत्त्व समस्या अधिक गंभीर होऊ शकतात. ‘

व्हिक्टर नेल यांनी त्यांचं पुस्तक ‘लाॅस्ट इन अ बुक : द सायकाॅलाॅजी ऑफ रीडिंग फाॅर प्लेजर’ यात ग्रंथोपचारावर विचार मांडले आहेत. ते म्हणतात, ‘वाचन शांती मिळवण्याची, अधिक शक्तिशाली होण्याची, धाडसी आणि शहाणं करण्याची दुर्मीळ संधी देतं. वास्तविक जगात असलेल्या इतर कोणत्याही गोष्टींइतकंच पुस्तकं उत्साहवर्धक, मनोरंजक असतात. ‘ सुप्रसिद्ध ग्रंथोपचार तज्ज्ञ बिजल शहा यांनी ‘बिब्लिओथेरपी: द हीलिंग पाॅवर ऑफ रीडिंग’ हे पुस्तक लिहिलं आहे. त्यात या उपचारपद्धतीची सविस्तर माहिती वाचायला मिळते.

‘घराबाहेर चपलांची रांग आणि घरात पुस्तकांचा ढीग’ असं चित्र ज्या घराचं असेल ते घर श्रीमंत आणि अभ्यासू माणसांचं असतं. तिथं ‘ग्रंथोपचाराची’ वेगळी गरज भासत नाही. या उपचारात पुस्तकं दिली जातात. सुचवली जातात. त्याचे कोणतेही दुष्परिणाम नसतात. घरोघरी ग्रंथालय असावं. ज्यामुळं भावी पिढीचं मानसिक आरोग्य उत्तम राहील. हा उपचार म्हणजे सकारात्मकतेचा, भावनिक साक्षरतेचा, सुंदर जगण्याचा एक मार्ग आहे. त्याचा उपयोग मात्र सर्वानी करून घ्यायला हवा.

© सुश्री अर्चना मुळे 

समुपदेशन तज्ज्ञ, सांगली

संपर्क – 21 ए बी,पार्श्व बंगला, श्रीवास्तुपूरम, धामणी रोड, सांगली – 416415

फोन – 9823787214 email : archanamulay5@gmail.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “मंत्रपुष्पांजली – इतिहास आणि आशय…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर ☆

श्री मोहन निमोणकर 

? इंद्रधनुष्य ?

☆ “मंत्रपुष्पांजली – इतिहास आणि आशय…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर

भारतीय इतिहासात अयोध्येचा एक राजा खणिनेत्र होऊन गेला. हा राजा प्रजेवर अत्याचार करत असे, म्हणून एक दिवस प्रजेने त्या राजाला राजपदावरून बेदखल केलं.

राजाची हकालपट्टी करणारी प्रजा हे एक विलक्षण उदाहरण इथे सापडतं.

खणिनेत्राला पायउतार करून त्याचा मुलगा आविक्षित याला राजा बनवले व सुयोग्य कारभार करण्यासाठी अनेक अटी प्रजेनी घालून दिल्या. वडिलांनी शेजारी राज्यांशी शत्रुत्व पत्करल्यामुळे आविक्षिताला वारंवार आक्रमणांच्या संकटांना तोंड द्यावे लागले. पण प्रजेच्या भक्कम पाठिंब्याने तो विजयी झाला आणि त्याने उत्तम राज्य केले. आविक्षित हा प्रजाहित रक्षक राजा होता. या आविक्षिताचा मुलगा मरुत्त.

आविक्षितस्य कामप्रे मधला हा आविक्षित 

मरुत्तस्यावसनगृहेमधला हा मरुत्त

हा मरुत्त चक्रवर्ती राजा झाला. त्याच्या गौरवासाठी रचली गेलेली ही मंत्रपुष्पांजली होय.

भारतात अनेक चक्रवर्ती राजे झाले मग या मरुत्ताचं वैशिष्टय काय? त्यानी प्रजेसाठी अनेक अडचणींना तोंड देत एक मोठ्ठा यज्ञ केला.

यज्ञ म्हणजे समाजातील अनेकांच्या भल्यासाठी केलेला प्रकल्पच.

यज्ञ म्हणजे असं मोठं कर्म ज्यात अनेक लोकांचा सहयोग घेऊन एक संघ तयार होतो. या संघातील सहयोगी हे विविध विषयांचे जाणकार, तज्ञ, कामगार असतात त्यांना “ऋत्विक” म्हणतात. या संघाच्या प्रमुखाला “होता” म्हणतात. हे सगळे मिळून एकत्र येऊन प्रजेच्या कल्याणासाठी यज्ञ करतात. जसे नदीवर बांध घालणे, तळी खणणे, डोंगरावर झाडी लावणे, जलाशय स्वच्छ करणे, अनाचारी दुष्ट चोरांवर वचक बसवणे, औषधोपचार करणे, शिक्षण देणे, अन्न धान्याची सोय करणे इत्यादि साठी अनेक यज्ञाची स्वरूपं आहेत. यज्ञ करणे म्हणजे सगळ्यांनी मिळून सगळ्यांच्या भल्यासाठी मोठं काम करणे.

यज्ञो वै श्रेष्ठतमं कर्म! अर्थात यज्ञ हे महानतम कर्म आहे.

तर मरुत्त राजानी प्रजेला दुष्काळापासून वाचवण्यासाठी मोठा प्रकल्प हाती घ्यायचं ठरवलं. पण मरुत्त राजाची कीर्ति यामुळे अधिकच पसरेल अशी ईर्ष्या उत्पन्न झाल्याने त्याकाळातील अनेक प्रबळ आणि संसाधन पुरवणा-या गटांनी(इंद्र आदि देवांनी) मरुत्ताला विरोध केला. मरुत्ताचे सल्लागार असलेल्या बृहस्पतिलाही त्यांनी ह्या यज्ञात सहयोग देण्यापासून परावृत्त केले. यामुळे खचलेल्या मरुत्त राजाला समवर्त नावाच्या बृहस्पतीच्या दुर्लक्षित भावानी मदत द्यायचं मान्य केलं.

समवर्तासोबत मरुत्त राजानी प्रकल्प पुढे नेला. एवढेच नव्हे तर नंतर हळू हळू मरुत्ताने सर्व विरोधक गटांना आमंत्रित करून, त्यांचं मन वळवून यज्ञात सहभागी करून घेतलं आणि यज्ञ उत्तमप्रकारे यशस्वी केला.

यामुळे मरुत: परिवेष्टारो मरुत्तस्यावसनगृहेअर्थात मरुत देव मरुत्त राजाच्या घरी अन्न देऊ लागले म्हणजेच मरुत्ताचे राज्य पर्जन्याने/योग्य पाऊस पाण्याने अन्नधान्यानी समृद्ध झाले.

अशाप्रकारे यज्ञेन… यज्ञाद्वारे मोठ्ठी कार्य सार्थकी लावता येतात ही पूर्वापार केवळ श्रद्धा नसून आपली परंपरा आहे. या परंपरेप्रमाणे सर्वांना सहभागी करत, अडचणीत मार्ग शोधत, न खचता लोककल्याणकारी प्रकल्प पूर्ण केल्याने संपन्नता (कुबेर म्हणजे संसाधन विपुलता) राहील आणि संपूर्ण पृथ्वीवर सार्वभौम प्रजाहितकारी राज्य पसरेल.

असा हा मंत्र पुष्पांजलीचा इतिहास आणि आशय आहे. एकत्र येऊन सर्व कल्याणासाठी यज्ञ करा हा समाज, देश आणि विश्व सुखी आणि आनंदी बनवण्याचा परंपराप्राप्त मार्ग वारंवार आपल्या सर्वांच्या मनावर बिंबवण्यासाठी ही मंत्रपुष्पांजली आहे.

मंत्रपुष्पांजली हे प्राचीन राष्ट्रगीत मानतात. मंत्रपुष्पांजलि शिवाय पूजेची सांगता होत नाही. स्पष्ट आणि शुद्ध उच्चार करण्यासाठी असा हा मंत्र खाली दिलाय.

प्रथम:

ॐ यज्ञेन यज्ञमयजन्त देवास्तानि धर्माणि प्रथमान्यासन्।

ते ह नाकं महिमान: सचंत यत्र पूर्वे साध्या: संति देवा:||

द्वितीय:

ॐ राजाधिराजाय प्रसह्य साहिने।

नमो वयं वैश्रवणाय कुर्महे।

स मे कामान् काम कामाय मह्यं।

कामेश्वरो वैश्रवणो ददातु कुबेराय वैश्रवणाय। महाराजाय नम:।

तृतीय:

ॐ स्वस्ति, साम्राज्यं भौज्यं स्वाराज्यं

वैराज्यं पारमेष्ठ्यं राज्यं महाराज्यमाधिपत्यमयं ।

समन्तपर्यायीस्यात् सार्वभौमः सार्वायुषः आन्तादापरार्धात् ।

पृथिव्यै समुद्रपर्यंताया एकरा‌ळ इति ॥

चतुर्थ:

ॐ तदप्येषश्लोकोभिगीतो।

मरुतः परिवेष्टारो मरुत्तस्यावसन् गृहे।

आविक्षितस्य कामप्रेर्विश्वेदेवाः सभासद इति ॥

 ॥ मंत्रपुष्पांजलीं समर्पयामि ॥

लेखक : अज्ञात

प्रस्तुती : श्री मोहन निमोणकर

संपर्क – सिंहगडरोड, पुणे-५१ मो.  ८४४६३९५७१३.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ शब्द – सुरांमधील ‘आत्मीय’ पत्रव्यवहार… – संग्राहक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

? इंद्रधनुष्य ? 

☆ शब्द – सुरांमधील ‘आत्मीय’ पत्रव्यवहार… – संग्राहक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित 

लता मंगेशकर      पु ल देशपांडे

शब्द-सुरांमधील ‘आत्मीय’ पत्रव्यवहार – – 

दुसऱ्यांची पत्रे वाचू नये असे म्हणतात, म्हणणाऱ्यांना म्हणू द्या, पण ही पत्रे वाचायचा आणि इतरांना ती दाखवायचा मोह काही आवरत नाही. जिथे लोभ असतो तिथे मोह असायचाच!

पु. ल. आणि लता. एक शब्दांनी खिळवून ठेवणारा तर दुसरा(री) स्वरांनी आणि सुरांनी. एकाचा विषय बुद्धीचा तर दुसऱ्याचा हृदयाचा. देवी सरस्वतीचा वरदहस्त दोघांनाही भरभरून लाभलाय आणि त्याच्या कृपाप्रसादाचे आपण सर्वांनी आकंठ रसपान केलेलं आहे. ह्या दोघांच्या निम्नलिखित पत्रव्यवहारात झालेली विचारांची देवाण-घेवाण म्हणजे मराठी वाचकांसाठी एक आनंदाची पर्वणी ठरावी.

…..  

(दि. १६ जून १९७९ रोजी लताबाईंनी पु. ल. ना लंडनहून पाठवलेले पत्र.. )

20, ABBEY Road, London N. W. 8 

Tel. – (01)286-5132

Room No. – 170

ती. प्रिय पी. एल.

चरणस्पर्श!

तुम्हाला कबूल केल्याप्रमाणे इथे आल्याबरोबर पत्र लिहायला हवे होते, पण १२ तारखेपर्यंत सारखी धावपळ चालू होती. १२ ला Albert Hall मध्ये The Wren Orchestra बरोबर कार्यक्रम होता. तुमच्या आशीर्वादाने कार्यक्रम चांगला झाला. चांगला म्हणजे लोकांना आवडला. या कार्यक्रमाची तिकिटे खूप लोकांना मिळाली नाहीत. त्यामुळे ३ जुलैला आणखी एक कार्यक्रम ठेवला आहे. उद्या Palladium मध्ये कार्यक्रम आहे. यात एकच गोष्ट समाधानाची- म्हणजे माझी प्रकृती बरी आहे, तुमची तब्येत अलीकडे बरी नसते, त्यामुळे का कुणास ठाऊक, पण मला खूप काळजी वाटते. तुमच्यासारख्या माणसांना कधीही काहीही त्रास होऊ नये असे मनापासून वाटते. तुम्ही कुठेही असलात आणि मजेत आहात असे नुसते कळले तरी बरे वाटते.

आता तुमची प्रकृती कशी आहे? कळवाल का? जुलै ११ पर्यंत मी London मध्येच आहे. सौ. वहिनी बऱ्या आहेत ना? त्यांना माझा नमस्कार! तुम्हाला पत्र लिहिताना फार भीती वाटते. कारण माझे मराठी जरा गडबडच आहे.

तब्येतीची खूप काळजी घ्यावी.

नमस्कार,

तुमची- लता

१६. ६. ७९

*~*~*~*~*

(स्व. पु. ल. देशपांडे यांनी स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर ह्यांना दिलेले पत्रोत्तर.. )

प्रिय लता,

तुझ्या इतक्या गडबडीच्या कार्यक्रमात आठवण ठेवून पत्र पाठवल्याबद्दल मनापासून आभार. तुला सायनसचा त्रास होत असल्याचे तू सांगितल्यामुळे मला काळजी वाटत होती. गाणाऱ्यांचे आणि नाटकात काम करणाऱ्यांचे शरीर हेच वाद्य असल्यामुळे ते नादुरुस्त राहून चालत नाही. एवढेच नव्हे तर चार माणसांसारखी हया कलावंताचीही प्रकृती आज ठीक नसेल असा विचार करायला प्रेक्षकही तयार नसतात. काही वर्षांपूर्वी ‘बटाट्याच्या चाळी’चा प्रयोग करीत असताना अचानक माझी पाठ धरली. तशा परिस्थितीत प्रयोग रेटला. लोक त्यातल्या विनोदाला हसत होते आणि मी मात्र मनात ‘लेको, तुम्हाला हसायला काय होते? माझे इथे काय हाल चालले आहेत ते माझे मला ठाऊक! ‘ म्हणत होतो. सिक लीव्ह वगैरे सोयी कलावंतांना नसतात.

तुझ्या सायनसने इंग्लंडच्या हवेत पळ काढला, हे वाचून मला खूप समाधान वाटले, तुझा कार्यक्रम चांगला झाला हे लिहिण्याची गरजच नाही. ‘कार्यक्रम झाला’ याचा अर्थच चांगला झाला.

माझी प्रकृती ठीक आहे. गुडघ्याचा संधिवात हेदेखील कलावंतासारखे लहरी दुखणे आहे असे मला वाटायला लागले आहे. विशेषतः साथीदार कलावंतासारखे, एखादे दिवशी माझे गुडघे अगदी मोकळेपणाने वागतात, तर कधी कधी एकाएकी निष्कारण आखडूपणा करायला लागतात. त्यांचे कधी काय बिनसते तेच कळत नाही. परवाच एक डॉक्टर आपण ऑपरेशन करून बघू म्हणाले। डॉक्टरांची बघण्याची हौस भागवण्याची जबाबदारी माझ्या अंगावर घ्यायची माझी इच्छा नसल्यामुळे मी त्यांना नम्रपणे नकार दिला. मला या सर्जन लोकांच्या ‘ओपन करून बघू’ या वाक्याची नेहमीच गंमत वाटते. नुसते उघडून बघायला आपले शरीर काय मोफत वाचनालयातल्या टेबलावर पडलेले मासिक वगैरे आहे असे यांना वाटते की काय? जाऊ दे।

तुझ्या पत्रातला Albert Hall, Palladium वगैरेचा उल्लेख वाचून पुन्हा एकदा इंग्लंडला जाण्याची माझी इच्छा बळावली. त्या देशात मी सात-आठ महिने काढले आहेत. जगातल्या बऱ्याच देशांत जायची संधी मला मिळाली.

मला इंग्लंड तर फार आवडतो. तसे प्रत्येक देशाचे आपापले वैशिष्ट्य आहे, जपान सुंदर आहे. इटली सुंदर आहे. पॅरिस किती छान आहे. पण भाषेच्या अडचणीमुळे तिथे अडाण्यासारखे वाटते. लंडनला मी पहिल्या दिवशीदेखील गिरगावात हिंडल्याच्या सहजतेने हिंडू लागलो. भाषा आली नाही की सर्दीने नाक चोंदल्याच्या अवस्थेत अत्तराच्या दुकानात गेल्यासारखे वाटते. इंग्रज तसा अबोल आहे, पण चतुराईने त्याच्या गळ्यातल्या टायची गाठ जरा सैल केली की गप्पागोष्टीत मस्त रंगतो. अर्थात आता लंडनचाही भेंडीबाजार झाला आहे. त्यामुळे आणि एकूणच जगातल्या सगळ्या महानगरांतून स्कायस्क्रॅपर संस्कृती आल्यामुळे लंडन-न्यूयॉर्क-टोकियो वगैरे इरॉस सिनेमापलीकडल्या मुंबईसारखीच झाली आहेत, हा भाग निराळा, पण इंग्लंडचा ग्रामीण विभाग अजूनही सुंदर आहे. तू शेक्सपीअरचे स्ट्रॅटफर्ड अपॉन एव्हन हे गाव पाहिलंस का? जरूर पहा. तिथे दरवर्षी शेक्सपीअरच्या नाटकांचा उत्सव चालू असतो. तिथल्या रंगमंदिरात शेक्सपीअरची नाटकं पाहा. एव्हन नदीकाठच्या त्या गावात नुसते हिंडत राहणे हादेखील अपूर्व आनंद आहे. ज्या कलावंतांनी, साहित्यिकांनी मनुष्यसमाजाला आनंद दिला त्यांची शतका-शतकापूर्वीची राहती घरे ही माणसं किती काळजीपूर्वक जतन करून ठेवतात पहा. माणसातल्या कृतज्ञतेचे आणि त्यातूनच दिसणाऱ्या मनाच्या श्रीमंतीचे हे द्योतक आहे. नाही तर आपण लोक। छत्रपती शिवाजीमहाराजांचा वाडा आपण टिकवून धरू शकलो नाही, तिथे इतरांची काय कथा?

– सुनीताने तुला केवळ वयाच्या वडिलकीचा आधार घेऊन आशीर्वाद सांगितले आहेत.

तुझा…  

पी. एल.

ता. क. तू मायन्यात ‘चरणस्पर्श’ केल्यामुळे मी चाट झालो. वयाने लहान असल्यामुळे तुला मी चरणस्पर्श म्हणू शकत नाही. आणि तुझ्या लक्षावधी गीतांतल्या एकाही गीतातल्या चरणाला स्पर्श करावा असा गळा देवाने मला न देता नुसताच घसा दिला आहे। पूर्वीचे राजे मुलूख पादाक्रांत करायचे, तू सारे जग ‘पदाक्रांत’ केले आहेस. हे तुझे सार्वभौमत्व चिरकाल टिको, ही शुभेच्छा।

┉❀꧁꧂❀┉

माहिती संग्राहक : अज्ञात

प्रस्तुती : श्री सुहास रघुनाथ पंडित 

सांगली (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ बिन खुर्चीचे डॉक्टर… लेखिका : सुश्री मैत्रेयी पंडित दांडेकर ☆ प्रस्तुती – सौ.बिल्वा शुभम् अकोलकर ☆

सौ.बिल्वा शुभम् अकोलकर 

? इंद्रधनुष्य ?

☆ बिन खुर्चीचे डॉक्टर… लेखिका : सुश्री मैत्रेयी पंडित दांडेकर ☆ प्रस्तुती – सौ.बिल्वा शुभम् अकोलकर 

डॉ. मधुकर लुकतुके

 – –

माझे बालपणीपासूनचे फॅमिली डॉक्टर – – अत्यंत प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व आणि आयुष्य!

हे लेखन वाचून साष्टांग दंडवत घालावासा वाटले नाही तरच आश्चर्य!

……   

कोकणातील दाभोळ हे निसर्गरम्य गाव. समुद्राच्या खाडीत वसलेलं, नारळी पोफळीच्या बागांनी सजलेलं आणि परंपरा जपणारं. पण या गावाचं खरं वैशिष्ट्य म्हणजे इथला एक साधा पण महान माणूस — डॉ. मधुकर लुकतुके, म्हणजेच सगळ्यांच्या प्रेमाने ओळखले जाणारे “बिन खुर्चीचे डॉक्टर. ”

१९३५ साली कोल्हापूरजवळच्या आजऱ्यात जन्मलेले हे डॉक्टर घरच्या बेताच्या परिस्थितीत मोठे झाले. पण गरिबीने त्यांची जिद्द कमी केली नाही. मुंबईच्या G. S. Medical College मधून एमबीबीएस पूर्ण करून त्यांनी शहरात नव्हे तर खेड्यात सेवा करण्याचा निर्णय घेतला. १९६० साली त्यांनी दाभोळ गाठलं आणि तेव्हापासून आजपर्यंत, तब्बल ६५ वर्षं, ते इथल्या लोकांची सेवा करत आहेत — तेही उभं राहून, बिन खुर्ची!

त्या काळात दाभोळमध्ये वीज नव्हती, रस्ते नव्हते, आणि आजार झाल्यावर डॉक्टर नाही तर देवाकडेच लोक हात जोडत. पण जोजो (त्यांचं प्रेमाचं नाव) मात्र खेडं ओलांडून, होडीने खाडी पार करून, डोंगर उतरून रुग्णांकडे पोहोचायचे. रात्रीची होडी चुकली तर पेशंटच्या घरीच झोपायचे. तेव्हा गावात “स्पेशालिस्ट” अशी संकल्पनाच नव्हती — काविळ, ताप, फ्रॅक्चर, विंचू-दंश, प्रसूती…   सगळ्याचं उत्तर एकच — जोजो!

जोजोंचा दवाखाना म्हणजे श्रद्धेचं ठिकाण. त्यांच्या दवाखान्यात खुर्चीच नाही, कारण ते कधी बसतच नाहीत! रुग्णासमोर उभं राहणं म्हणजे “मी तुझ्या बरोबर आहे” हा त्यांचा संदेश. त्यांच्या बोलण्यातला विनोद, हजरजबाबीपणा आणि आत्मीयता हीच औषधं होती. एकदा एक मुलगा बोलणं बंद झाला म्हणून आई त्याला घेऊन आली, तर जोजो म्हणाले, “अरे प्रदीप, त्या गुरांच्या डॉक्टरला बोलाव — न बोलणाऱ्यांचं निदान त्यांनाच जमतं! ” आणि एवढं ऐकताच मुलगा घाबरून बोलू लागला! अशा हसवणाऱ्या आठवणींनी दवाखान्यात नेहमी आनंदाचं वातावरण असायचं.

जोजोंची सेवा म्हणजे केवळ डॉक्टरी नव्हे तर माणुसकीचा सर्वोत्तम नमुना. गरीब रुग्णांकडून कधी फी घेतली नाही. कोणी तांदूळ आणायचं, कोणी काजू, तर कोणी मासे — तेवढंच पुरेसं होतं. असिस्टंटला योग्य वेतन, आदर आणि शिक्षण — हे त्यांनी नेहमी जपलं.

सोमवार ते शनिवार सकाळी ७ ते १, मग व्हिझिट, पुन्हा दुपारी ३. ३० ते ६. ३०, आणि रविवारी अर्धा दिवस — इतकी कडक शिस्त अजूनही कायम आहे. त्यांच्या जीवनातील खरी साथीदार म्हणजे त्यांची पत्नी, स्वर्गीय आशा लुकतुके, जिने त्यांच्या सोबत राहून हे सगळं साध्य केलं.

आज ८९व्या वर्षातही डॉ. लुकतुके दररोज सकाळी ताठ उभे राहून, टापटीप पोशाखात, तितक्याच ऊर्जेने पेशंट तपासतात. रिटायरमेंट? जोजोंच्या डिक्शनरीत असा शब्दच नाही. निसर्गाच्या सान्निध्यात त्यांनी कमावलेला आत्मविश्वास, शारीरिक आणि मानसिक आरोग्य आजही त्यांच्या चेहऱ्यावर झळकतं.

दाभोळच्या या बिन खुर्चीच्या डॉक्टरांनी दाखवून दिलं — सेवेसाठी खुर्ची, पुरस्कार किंवा प्रसिद्धी लागत नाही, लागते ती फक्त माणुसकी, समर्पण आणि प्रेम!

त्यांचा प्रवास म्हणजे प्रत्येकाला विचार करायला लावणारी प्रेरणादायी कथा — की आपण जे करतोय त्यात मनापासून, न थकता, न थांबता दिलं, तर आपणही कुणाचं “जोजो” होऊ शकतो.

“जोहार मायबाप जोहार! तुमच्या महाराचा मी महार! ” 

… संत चोखामेळा यांचा अमर अभंग माझ्याकडून डॉक्टर लुकतुके यांच्यासाठी …

*

जोहार मायबाप जोहार ।

तुमच्या महाराचा मी महार ॥१॥

*

बहु भुकेला जाहलों ।

तुमच्या उष्टयासाठीं आलों ॥२॥

*

बहु केली आस ।

तुमच्या दासाचा मी दास ॥३॥

*

चोखा म्हणे पाटी ।

आणिली तुमच्या उष्टयासाठीं ॥४॥

*

…   कलियुगात अशी थोर व्यक्तिमत्त्वे अस्तित्वात आहेत हे आपले नशीब! असे थोर डॉक्टर मला बालपणी लाभले.

लेखन : मैत्रेयी पंडित – दांडेकर.

प्रस्तुती :  सौ.बिल्वा शुभम् अकोलकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ।। श्री नारद उवाच ।। – नारद भक्ति सूत्रे —सूत्र २८ ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ☆

श्री संदीप रामचंद्र सुंकले

? इंद्रधनुष्य ?

।। श्री नारद उवाच ।। – नारद भक्ति सूत्रे — सूत्र २८ ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले 

।। श्री नारद उवाच ।। 

नारद भक्तीसूत्र २८ . 

तस्या ज्ञानमेव साधनमित्येके ॥ २८ ॥

अर्थ : त्या (भक्तीचे) ज्ञान हेच साधन आहे असे कोणी (आचार्य) म्हणतात.

विवेचनभक्ती ही कर्म, ज्ञान, योग यापेक्षा श्रेष्ठ आहे. ती फलरूपा आहे असे मागील काही सूत्रात स्पष्ट सांगितले गेले आहे. जर ती फल म्हणजे साध्यच असेल तर तिला कोणत्या तरी साधनाची अपेक्षा असणारच. साधनाविना साध्यप्राप्ती होऊ शकत नाही. 

आपल्याकडे चार प्रकारचे भक्त सांगितले आहेत. आर्त, अर्थार्थी, जिज्ञासू, ज्ञानी. त्यात ज्ञानी भक्तच श्रेष्ठ असे मानले जाते. श्रीज्ञानेश्वरमहाराजांनी अनेक ठिकाणी या विषयाचा विचार केला आहे. ज्ञान नसेल तर भक्ती होणार नाही, असेही म्हटले जाते. ज्ञान नसेल तर भगवंताचे यथार्थ स्वरूप कळू शकणार नाही. अन्यथा मनुष्य क्षुद्र देवतांच्या भजनी लागू शकतो. समर्थांनी त्यांच्या काळात अशा क्षुद्र देवतांना मुक्ति दिली आहे असल्याचे आपल्या लक्षात येईल. भक्ति करण्यासाठी ज्ञान पाहिजे असे त्याचे म्हणणे असते असे काही चिंतकांचे मत आहे. 

येथे ज्ञान हा शब्द थोडा संदिग्ध वाटतो. भक्तीचे जसे स्वरूप घेतले जाईल तसे ते ज्ञान ठरणार, नाही का? निराकार, निर्गुण परमात्मस्वरूपाची भक्ती मानली तर त्या स्वरूपाचे ज्ञान उपनिषदादी प्रमाणांवरून होते आणि सगुण साकाराची मानली तर त्याचे अनंत गुण, अनंत लीला, माधुर्य, सौंदर्य तसेच रूप, आकार, त्यांचे अनेक प्रकार इत्यादिकांचे ज्ञान मानावे लागते. मागील काही सूत्रांत व्यास-गर्ग-नारद याची मते आपण अभ्यासली आहेत. त्यावरून त्यांना केवळ निर्गुण-निराकाराचे ज्ञान येथे अभिप्रेत आहे असे जाणवत नाही. कारण त्या ज्ञानात मुक्ती हे साध्य आहे, भक्ती नाही. ज्ञान हे त्या भक्तीचे सर्वश्रेष्ठ साधन असते तर गीता व भागवत एकादश स्कंधामध्ये भक्तीमध्ये अन्य साधनांचा निषेध केला गेला नसता.

यज्ञ-ज्ञान-तपें केली, वेदाभास ही साधिला|

तरी दर्शन हे माझे, न लाभले तुज||”

(गीताई ११.५३)

संत एकनाथ महाराज आपल्या भागवतात लिहितात की भक्तीनेच ज्ञानाची प्राप्ती होत असते.

“माझें भजन करितां । न पडे ज्ञानाची पंगिस्तता । 

माझे भजनें नित्यमुक्तता । जाण मद्‍भक्तां मद्‍भावें ॥५८॥ 

*

ज्ञानेंवीण भक्ति न घडे । म्हणती तें शब्दज्ञान धडफुडें । 

भक्तीस्तव जाण रोकडें । ज्ञान जोडे अपरोक्ष ॥५९॥

(एकनाथी भागवत अध्याय ११)

पुढील सूत्रात भक्ति मुळेच ज्ञानाची प्राप्ती कशी होते ते तपशिलात पाहू . 

।। जय जय रघुवीर समर्थ ।।

।। नारद महाराज की जय!!! ।।

– भक्ती सूत्रे क्र.२८

© श्री संदीप रामचंद्र सुंकले (दास चैतन्य)

थळ, अलिबाग. 

८३८००१९६७६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “प्रभाकरन विरुद्ध प्रभाकर” ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

☆ “प्रभाकरन विरुद्ध प्रभाकर !” ☆ श्री संभाजी बबन गायके

जयो वा वधो संग्रामे….

जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाचा अंत कसा आणि कधी होईल, हे नियतीने ठरवून ठेवलेलं असतं आणि मृत्यू नावाचा हा सोहळा त्यानुसारच पार पडत असतो!

युद्धात सहभागी होणाऱ्या प्रत्येक वीराला हे ठाऊक असतं!

१९८७…भारताला शेजारच्या श्रीलंकेत राजकीयदृष्ट्या लक्ष घालावे लागले. आपले सैन्य हे देशाच्या राजसत्तेच्या अधीन असते. श्रीलंकेत मूळचे सिंहली आणि कित्येक वर्षांपूर्वी भारतातून तिथे जाऊन स्थायिक झालेले तमिळवंशीय यांच्यात उफाळून आलेल्या सत्ता संघर्षात दोन्ही बाजूंना काबूत ठेवत शांतता प्रस्थापित करण्याची जबाबदारी भारतीय सैन्याला सोपवण्यात आली. श्रीलंकेतील तमिळ मूळचे भारतीय आहेत, ते भारतीय सैन्याच्या विरोधात शस्त्र उचलणार नाहीत, हा अंदाज शंभर टक्के खोटा ठरला! आणि LTTE अर्थात Liberation Tigers of Tamil Elam या तामिळ संघटनेच्या बंडखोरांशी भारतीय सैन्याच्या लढाईचे श्रीलंकेतील रामायण सुरू झाले. गुरिल्ला पद्धतीचे युद्धकौशल्य आत्मसात केलेल्या या बंडखोरांनी  भारतीय सैन्यास प्रचंड विरोध आणि प्रतिहल्ला करण्यास आरंभ केला. आधी पाठवलेली फौज आणि युद्धसामग्री अपुरी ठरली. मग अधिकची कुमक पाठवली गेली. ऑपरेशन पवन नावाची युद्ध कारवाई सुरुवातीला अत्यंत मोठ्या संकटात सापडली! भारतीय सैन्याचे इलेक्ट्रॉनिक संदेशवहन जाळे बंडखोरांनी भेदण्यात यश मिळवले होते. यातून त्यांनी सैन्याच्या हालचालींची माहिती आधीच मिळवत आपल्या मोठ्या सैन्याला जेरीस आणले होते! तमिळ बंडखोरांना स्थानिक तमिळ जनतेचा फार मोठा पाठिंबा होता. श्रीलंकेतील दाट जंगल,हवामान भारतीय सैन्याला पुरेसे परिचित नव्हते. त्यात त्यांनी प्रतिकाराच्या नव नव्या पद्धती अवलंबल्या होत्या. त्यांचे खबऱ्यांचे जाळे खूप मजबूत होते. सैन्याच्या रस्त्यात छोटी स्फोटके पेरण्यात ते नेहमीच यशस्वी होत असत. वरवर सामान्य दिसणारे नागरिक हत्यारबंद असत. पकडले गेले तर हे बंडखोर गळ्यात बांधलेली सायनाईड गोळी खाऊन थेट आत्महत्या करीत असत…त्यामुळे त्यांच्याकडून गुप्त माहिती मिळणे अशक्य होई. अगदी आठ दहा वर्षांची मुले बंडखोरांना साहाय्य करीत असत. गस्तीवर,कारवाईसाठी निघालेल्या आपल्या भारतीय सैन्य तुकडीत नेमके किती सैनिक आहेत, याची माहिती त्यांना अचूक मिळे आणि गावातील मंदिरे,चर्चेस यांतील घंटेचे टोल त्या संख्येत वाजवून दूर लपून बसलेल्या बंडखोरांना सूचना दिली जाई. लहान मुले पुढे पळत जात आणि पुढे उभे असणाऱ्या सायकलस्वार मुलाला निरोप देई…आणि तो पुढे जाऊन आणखी दुसऱ्या व्यक्तीला निरोप देत असे! जंगलात लपून बसून अचूक निशाणेबाजी करण्यात बंडखोर निपुण होते. त्यांनी आपले अनेक अधिकारी टिपले होते. एका भयावह घटनेत आपल्या काही कमांडो सैनिकांना एका सामान्य दिसणाऱ्या नागरिकाने.. एका दुकानाचा पत्ता दाखवतो म्हणून थेट बंडखोरांच्या तावडीत नेऊन सोडले होते…या सर्व सैनिकांची त्यांनी अत्यंत निर्दय,अमानुषपणे हत्या केली!

रेडिओ फ्रीकवेन्सी बाबतही त्यांच्याकडे अचूक यंत्रणा होती…एकूण भारतीय सैन्यापुढे अनपेक्षित असे आव्हान उभे राहिले होते..पण भारतीय सैन्य मागे सरणाऱ्या पैकी नव्हते! 

अन्नाई- कोट्टई नावाचे ठिकाण. भारतीय सैन्याची एक मोठी तुकडी जाफना किल्ला ताब्यात घेण्याच्या मोहिमेवर होती. त्यापूर्वी दोन दिवस भारतीय सैन्याने आक्रमण स्थगित केले होते. आणखी युद्धसाहित्य मागवून घेऊन जोरदार प्रतिहल्ला चढवण्याची तयारी सुरू होती.  अपरिचित प्रदेश,जंगल. मात्र  या तुकडीला बंडखोरांनी सर्वच बाजूंनी घट्ट वेढा घातला…आणि गोळीबाराचा फास आवळत आणला..एवढा की सर्व तुकडीच नष्ट होण्याच्या मार्गावर होती. या कारवाईत हलकी शस्त्रे सोबत नेलेली होती आणि दारूगोळा मोठ्या प्रमाणात लागणार नाही असा अंदाज होता. पण युद्धात कधीही काहीही होऊ शकते. सैन्याने त्वेषाने प्रतिकार सुरू ठेवला….पण दारूगोळा संपत आला होता! तुकडीने तातडीचा संदेश पाठवला…दारूगोळा पाठवा! हेलिकॉप्टर मधून दारूगोळा पाठवण्याचे प्रयत्न तमिळ बंडखोरांनी मोठा गोळीबार करून हाणून पाडले! यावर पायदळ सैनिकांच्या हातून हे काम पूर्ण करण्याचे आदेश दिले गेले. ८,महार रेजिमेंट यावेळी तिथे हजर होती. लष्करी वाहनातून रस्ते मार्गे दारूगोळा न्यायचे ठरले.

पंधरा सैनिक, एक अधिकारी यांचे एक आत्मघातकी पथक पाठवायचे ठरले. कॅप्टन सुनील चांदेर यांना नेतृत्व दिले गेले. शत्रूचा वेढा भेदून आपल्या सैनिकांना दारूगोळा पोहोचवायचा होता..छोटी वाहने वापरून शक्य तितके अंतर कापायचे होते….वाटेत तमिळ अतिरेकी दबा धरून बसलेले होते. यातून मार्ग काढत पुढे जायचे होते. शत्रूला आपल्या या मोहिमेची खबर लागली होती…त्यांनी सापळे रचून ठेवले… मात्र आपल्या सैनिकांना थांबून चालणार नव्हते…वेढ्यात अडकलेल्या सैनिकांना वेळेत दारूगोळा मिळाला नाही तर ते मरणाच्या जबड्यात अलगद जाणार होते!

त्यांच्या या वेढ्याला जबरदस्त धडक दिली तरच पुढे जाता येणार होते. या तामिळ वाघांच्या अंगणात भारतीय वाघांना घुसून त्यांचे दात पाडायचे होते. कामगिरी अशक्यप्राय होती…वाहने निघाल्याची खबरही बंडखोरांना मिळालेली असावी! त्यांनी या वाहनांना लक्ष्य करीत हल्ले चढवायला सुरुवात केली. पंधरा पैकी आठ सैनिक धारातीर्थी पडले…खालून आग वर..आग आग बाजूंनी..अशी स्थिती होती….पण या गनिमांना थेट भेट देऊन पुढे जाणे त्या परिस्थितीत अनिवार्य झाले होते!

वाहनातून उतरून कॅप्टन सुनील साहेब आणि उर्वरित सैनिक पुढे सरसावले…त्यांच्यावर सर्व बाजूंनी गोळीबार सुरू झाला. कॅप्टन साहेबांचा एक पाय हातगोळ्याच्या माऱ्यात निकामी झाला. तरीही साहेब गोळीबार करीत पुढे जात राहिले …हातांच्या कोपरांवर सरपटत राहिले! वेढ्यात सापडलेली तुकडी आता थोड्याच अंतरावर राहिली होती. तिला वेढा घातलेल्या बंडखोरांनी आपला मोर्चा सुनील साहेबांच्या तुकडीकडे वळवला…प्रचंड गोळीबार सुरू केला..पण साहेब मागे हटले नाहीत!पण आपला हा वाघ जखमी झाल्याने नाईलाज होता!

आणि….बंडखोरांचा सर्वांत घट्ट वेढा आता तोडावाच लागणार होता….आपल्या त्या तुकडीवर मोठा गोळीबार सुरू होता….फक्त दोन हातगोळे आणि सहाच गोळ्या शिल्लक राहिल्या होत्या…चार दोन मिनिटांत आपले ते सैनिक मृत्यूच्या दाढेखाली जाणार हे उघड होते…प्रभाकरन…LTTE चा म्होरक्या…ज्याने भारताचे तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांची हत्या घडवून आणली होती…तो जिंकत आला होता!

८,महार चे कॅप्टन सुनील चंदेर साहेब जबर जखमी होते….हाताशी केवळ आठ जवान उरलेले होते…आता वेढा तोडायलाच हवा होता….आणि याच क्षणी महाराष्ट्राचा वाघ डर काळी फोडत पुढे झेपावला…बोलो हिंदुस्थान की जय! यश सिद्धी हे रेजिमेंटचे ब्रीद खरे करून दाखवण्याची ही वेळ होती! १ जून १९६७ रोजी सोलापूरच्या वागदरीत जन्मलेला हा वाघ..प्रभाकर यमाजी पात्रे …वयाच्या अवघ्या एकोणिसाव्या वर्षी लष्करात शिपाई म्हणून भरती झाला होता आणि दोनच वर्षात त्याला श्रीलंकेत Indian Peace Keeping Force सोबत नेमणूक मिळाली होती! 

प्रभाकर हातातील रायफल घेऊन थेट बंडखोरांवर चालून नव्हे…धावत गेले….रायफल धडाधडत होती….पण समोरून ऑटोमॅटिक मशीन गन मधून, रॉकेट लाँचर मधून हल्ला सुरू होता…प्रभाकरन थांबले नाहीत…छातीत गोळ्या घुसत राहिल्या….प्रभाकर यांचा गोळीबार थांबला नाही…बंडखोरांना या प्रतियुत्तराची अपेक्षा नव्हती…त्या सर्वांनी प्रभाकर यांच्यावर लक्ष केंद्रित केले…प्रभाकर यांनी कौरवांची फळी कापून काढली… वेढ्याला खिंडार पडले..त्यातून वाट काढत उरलेले  सैनिक पुढे गेले…दारूगोळ्याचे वाहन पुढे सरकले…कॅप्टन सुनील साहेबांच्या कुडीत प्राण शिल्लक होते…त्यांनी गोळीबार थांबवला नव्हता..ते ही सरपटत वेढ्यात शिरले….केवळ सहा राऊंड गोळ्या आणि दोन हातगोळे शिल्लक असलेल्या तुकडीला दारूगोळा मिळण्याचा मार्ग अगदी मोक्याच्या क्षणी मोकळा झाला..जणू अखेरचा श्वास घेताना प्राणवायू धावून आला….कॅप्टन सुनील चंदेर आणि शिपाई प्रभाकर बयाजी पात्रे आपल्या suicide squad चे उद्दिष्ट पूर्ण करण्यात यशस्वी ठरले होते…. पण त्यांचे प्राण घेण्यात LTTE ला दुर्दैवाने यश मिळाले… रणात विजय मिळेल पण वीरगती सुद्धा मिळणार हे नियतीने ठरवून ठेवले… नियतीची ही योजना शिपाई प्रभाकर पात्रे यांनी प्रत्यक्षात आणली. श्रीलंकेच्या त्या परक्या युद्धभूमीत हे आणखी दोन मोहरे गळाले…जिथे पुढे धारातीर्थी पडलेल्या सैनिक ,अधिकाऱ्यांची संख्या एकूण ११५७ झाली…३००० पेक्षा अधिक वीर जखमी झाले!

वरिष्ठांनी दिलेल्या आदेशांची अंमलबजावणी करताना भारतीय सैनिक प्राणांची पर्वा करीत नाहीत.. हे सिद्ध झाले. 

वयाच्या एकविसाव्या वर्षी प्रभाकर पात्रे कर्तव्यासाठी मरून अमर हुतात्मा झाले. या कार्यासाठी कॅप्टन सुनील चंदेर आणि शिपाई प्रभाकर पात्रे यांना मरणोत्तर वीर चक्र प्रदान केले गेले! या वीर सैनिकांस भावपूर्ण श्रद्धांजली..जय हिंद!

(यानंतर IPKF ने जाफना किल्ला जिंकला…LTTE चा बिमोड करून ही शांतिसेना भारतात परतली! महाराष्ट्राच्या प्रभाकर यांनी प्रभाकरन याच्याशी प्राणांतिक झुंज दिली..असेच म्हणावेसे वाटते.) 

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ‘वाहे गुरु :: गुरु नानकदेव – –’ ☆ श्री दिवाकर बुरसे ☆

श्री दिवाकर बुरसे

? इंद्रधनुष्य ?

☆ ‘वाहे गुरु :: गुरु नानकदेव – –’ ☆ श्री दिवाकर बुरसे

(आज कार्तिक पौर्णिमा. शीख धर्माचे प्रवर्तक श्री गुरु नानक यांची ५५६ वी जयंती. त्यानिमित त्यांचे हे पुण्यस्मरण!)

गुरु नानकदेव

(जन्मः १५ एप्रिल १४६९ – – मृत्यूः २२ सप्टेंबर १५३९)

प्रास्ताविक

‘शीख’ म्हणजे ‘शिकवण’, ‘शिकणारा’. शीख धर्म हा जगातील सर्वात तरुण धर्म आहे. याला हिंदु धर्माचाच एक उपपंथ म्हणता येईल. याचा उगम भारतीय उपखंडातील पंजाब प्रदेशात १५ व्या शतकाच्या अखेरीस, अतिरेकी, रानटी, कर्मठ, जिहादी, इस्लामच्या धार्मिक छळातून मुक्त होण्यासाठी विकसित झाला. हिंदु धर्मातील अतिरेकी आणि छळवादी प्रथा- परंपरा श्रद्धा यांपासून मुक्त होण्यासाठीही या काळात अनेक लोक हिंदू आणि मुसलमान या नव्याने स्थापन झालेल्या धर्मात धर्मांतरित झाले.

पुढे भारतातील मुघल सम्राटांनी खालील दोन शीख गुरूंचा अनन्वित छळ केला, त्यांना मृत्युदंड दिला कारण काय तर त्यांनी इस्लाम स्वीकारण्यास नकार दिला!

१ गुरू अर्जन (१५६३-१६०५) आणि

२ गुरु तेग बहादूर (१६२१-१६७५)

इस्लामिक काळात झालेल्या शिखांच्या अत्यंतिक क्रूर, अमानुष छळामुळे अखेर १६९९ मध्ये दशमगुरू गोविंद सिंग यांनी याच शीख धर्मातून ‘खालसा’ या जहाल, अति आक्रमक पंथाची स्थापना केली. या विशिष्ठ पंथाच्या स्थापनेमागचा मुख्य उद्देश म्हणजे हिंदूचे, हिंदुधर्माचे रक्षण करणे. या पंथातील सदस्यांना “संत-सिपाही” म्हणजे ‘संत वृत्तीच्या व्यक्तींनी सैनिकाचे गुण धारण केलेले सदस्य’ असे म्हटले जाते.

खालसा पंथातील ‘माझा ‘निर्भय संत सिपाही’ हजारोंच्या गर्दातूनही उठून दिसला पाहिजे’ म्हणून गुरु गोविंद सिंहजीने त्याला विशिष्ठ वेशभूषा धारण करायला सांगितले. केस, कृपाण, कच्छा, कंगी किंवा कंगवा, कडे हे पाच ‘क’ कार धारण करणारे आणि माथ्यावर वाढलेले केस आणि ते अच्छादित करण्यासाठी, झाकण्यासाठी धारण केलेली पगडी असे, समाजात कुठूनही उठून दिसणारे शीख बंधू ते हेच खालसा संत सिपाही!

चला तर, या मूळ शीख धर्माविषयी, त्याच्या प्रवर्तकाविषयी थोडक्यात माहिती करून घेऊन, त्यांच्या पुण्यस्मृतींस कृतज्ञतापूर्वक भावपूर्ण अभिवादन करूया!

शीख धर्माचे आदिगुरु नानक – जन्म व बालपण

शीख धर्माचे प्रवर्तक व आद्य गुरू नानकदेव त्यांचा जन्म लाहोर जिल्ह्यातील ‘तळवंडी’ (सध्या पाकिस्तानमधे आहे) या गावी वेदी शाखेच्या एका खत्री (क्षत्रिय) हिंदू कुटुंबात, कार्तिक पौर्णिमा म्हणजे त्रिपुरी पौणिमेला, १५ एप्रिल १४६९ साली झाला. (तळवंडी गावाला आता ‘नानकाना साहिब’ ह्या नावाने ओळखले जाते.) त्यांच्या आईचे नाव ‘त्रिपताका’ व वडिलांचे ‘काळूचंद’ होते.

नानकदेव एकुलते एक पुत्र असल्यामुळे लाडात वाढले. वडील काळूचंद वेदी हे शासकीय पटवारी होते. नानकदेवांचे शिक्षण घरीच झाले. लहानपणी ते गणित, हिंदी, अरबी, फार्सी ह्या भाषा शिकले. वेद व कुराणाचेही त्यांनी अध्ययन केले. ते बुद्धीने कुशाग्र होते. बालपणापासूनच त्यांची वृत्ती सात्त्विक व धार्मिक होती. त्यांचा बहुतेक वेळ साधुसंतांच्या व फकिरांच्या सहवासात आणि एकांतात बसून चिंतन करण्यात जाई.

वडिलांना त्यांची ही विरागीवृत्ती आवडत नव्हती. गुरे चारणे, शेत राखणे इ. कामे त्यांनी नानकांना दिली, तरी त्यांची वृत्ती पालटली नाही. त्यांचे मन लौकिक व्यवहारात, संसारात रमावे म्हणून त्यांनी नानकांचा विवाह वयाच्या अठरा वर्षी (१४८७) ‘बटाला’ येथील ‘मूलचंद खत्री’ यांच्या ‘सुलखनी’ या कन्येशी करून दिला. त्यांना सुलतानपूर येथील शासकीय धान्यकोठारावर (मोदीखाना) नोकरीस लावून दिले. यथावकाश नानकदेवांना ‘श्रीचंद’ व ‘लक्ष्मीदास’ असे दोन पुत्र झाले. त्यांनी नोकरी व्यवस्थितपणे केली, लौकिक अर्थाने संसारही ‘नेटका’ केला. तरीही त्यांचे मन परमार्थाकडेच धाव घेत राहिले. ते सदा ईशचिंतनात मग्न असत. प्रत्यही सकाळी उठून ते जवळच्या ओढ्यावर स्‍नानास जात व नंतर काठावर येऊन प्रार्थना, ध्यानधारणा करत.

ज्ञानप्राप्ती

एके दिवशी नित्याप्रमाणे ते स्‍नानानंतर जवळच्या एका गुहेत जाऊन ध्यान करू लागले. बघता बघता त्यातच त्यांची समाधी लागली. समाधी अवस्थेत त्यांना ईश्वरी साक्षात्कार झाला, दिव्य ज्ञानमार्ग दिसला. ह्या दिव्य मार्गानुसार उपदेश करण्यासाठी, समाजातील लोकांचे दुःख दूर करण्यासाठी ते गुहेतून बाहेर पडले.

गुहेतून बाहेर येताच ते ‘कोणी हिंदूही नाही व कोणी मुसलमानही नाही’ असे उच्चरवाने लोकांना सांगू लागले. हिंदु-मुस्लिम हे भेद खरे नसून सर्वजण प्रथम मानव आहेत व सर्वजण त्या एकमेव परमेश्वराची लेकरे आहेत असे त्यांचे म्हणणे असे. त्यांनी आपल्या या नव्या धर्मकल्पनेत पुढील पाच तत्त्वांच्या आचरणावर भर दिला:

१) नाम व गान : ईश्वराचे नामस्मरण करून त्याचे गुणगान करणे.

२) दान : सर्वांना दानधर्म करणे.

३) अश्‍नान (स्‍नान) : प्रत्यही प्रातःकाळी स्‍नान करून शुचिर्भूत होणे.

४) सेवा : परमेश्वराची व मानवाची सेवा करणे.

५) सिमरन (स्मरण) : आत्मसाक्षात्कारासाठी, ईश्वरी कृपा प्राप्त करून घेण्यासाठी त्याचे अखंड नामस्मरण करणे, त्याची कारुण्यभावे प्रार्थना करणे.

धर्मस्थापना व धर्मप्रचार

ईश्वरी साक्षात्कार व दिव्य ज्ञानप्राप्तीपश्चात यांनी शासकीय सेवा सोडून दिली आणि सद्‍धर्मप्रचारार्थ घराबाहेर पडले.

साक्षात्कारानंतर (१४९७) पासून दोन तपे त्यांनी चार प्रदीर्घ यात्रा केल्या. यात्रांमध्ये त्यांनी विविध धर्मांच्या अधिकारी व्यक्तींशी, साधुसंतांशी, फकिरांशी, योग्यांशी, सूफींशी चर्चा, विचारविनिमय, संवाद केले. विविध चालीरीती, रूढी, परंपरा श्रद्धांचा परिचय करून घेतला. अहितकारक दुष्ट रूढींविरुद्ध प्रचार करून त्यांच्या निर्मूलनाचेही प्रयत्‍न केले.

देशाटन, पंडितमैत्री, लोकसंग्रह 

त्यांनी केलेल्या चार प्रदीर्घ यात्रा : 

१) पूर्वेकडील यात्रा (१४९७ ते १५०९) : बांगलादेश व ब्रह्मदेशापर्यंत.

२) दक्षिणेकडील यात्रा (१५१० ते १५१५) : श्रीलंकेपर्यंत.

३) उत्तरेकडील यात्रा (१५१५ ते १५१७) : हिमालय व तिबेट, चीनपर्यंत.

४) पश्चिमेकडील यात्रा (१५१७ ते १५२१) : मध्यपूर्वेतील इराक, इराण, मक्का-मदीना, बगदाद, अफगाणिस्तान पर्यंत.

या देशाटनात त्यांना सहस्रावधी लोकांशी, विविध धर्मपंडितांशी, साक्षातकारी महापुरुषांशी, साधु – सन्यासी – बैगाग्यांशी, विचारवंतांशी संपर्क साधता आला.

गायक नानक

नानकदेवांचा कंठ मधुर होता. त्यांना भारतीय शास्त्रीय संगिताचेही चांगले ज्ञान होते. स्व-रचित उत्स्फूर्त भजने ते विविध रागदारीत आपल्या मधुर वाणीने आळवीत. त्यांची भक्तीने ओथंबलेली भजने ऐकण्यासाठी अनेक लोक जमत. ते स्वतःला नानकदेव म्हणवून घेण्यापेक्षा त्यांना ‘गायक नानक’ म्हणून घेणे अधिक प्रिय वाटे, संगितकलेवर त्यांचे अतोनात प्रेम होते! तळवंडी येथील ‘मर्दाना’ नावाचा एक मुसलमान नानकदेवांच्या भजनात त्यांना ‘रबाब’ वाद्य वाजवून साथ करीत असे. तोच त्यांचा पहिला अनुयायी होय.

नवा गाव कर्तारपूर

चौथ्या यात्रेहून परतल्यावर (१५२१) त्यांनी रावी नदीच्या पूर्व तटावर ‘कर्तारपूर’ नावाचे एक नवीन गाव वसविले. तेथे ते स्वतः नांगर चालवून शेती करू लागले. सकाळ – संध्याकाळचा त्यांचा वेळ कीर्तन, भजन, निरूपण व धर्मोपदेश यांत व्यतीत होई. त्यांना तेथे अनेक अनुयायी लाभले. त्यात हिंदू प्रमाणे मुसलमानही होते. त्यांनी उर्वरित सर्व आयुष्य तेथेच आपल्या कुटुंबियांसमवेत व अनुयायांसमवेत व्यतीत केले.

अवतार विसर्जन

मृत्युची चाहूल लागताच त्यांनी आपला पट्टशिष्य ‘भाई लेहणा’ याचे ‘अंगद’ असे नामकरण करून त्याला आपला वारस नेमले. ‘अंगद’ म्हणजे ‘स्व-शरीराचा भाग’. १५३९ मध्ये त्यांनी आपली ज्ञानतपस्याज्योती अंगददेव यांच्या देहात स्थापित करून देहत्याग केला. हिंदू आणि मुसलमान अनुयायांनी त्यांच्या मृत देहावरील वस्त्र अर्धे अर्धे वाटून घेतले आणि आपापल्या धर्मांनुसार त्यावर अंत्यसंस्कार केले. मधे एक आडवी भिंत उभारून दोन्ही समाजांनी गुरु नानक देवांचे कर्तारपूर येथे स्मारक उभारले.

ग्रंथसाहिब, जपुजी, मूलमंत्र

ग्रंथसाहिब ह्या शीख धर्मग्रंथात नानकदेवांची एकूण ९४७ पदे आहेत. या ग्रंथात आरंभी ‘जपुजी’ म्हणजे ‘ईश्वर चिंतन’ या नावाचा ३८ कडव्यांचा एक भाग आहे. तो पंजाबी भाषेत रचला आहे. महाराष्ट्रात ज्ञानेश्वरकृत ‘ हरिपाठा’ला आणि समर्थांच्या ‘ मनोबोधा’ ला जसे महत्व आहे तसेच शीख धर्मात या ‘जपुजी’ ला महत्व आहे. उदात्त सौंदर्य व दार्शनिक, आध्यात्मिक समृद्ध आशय यांचा उत्स्फूर्त काव्याविष्कार त्यात दिसून येतो. जपुजीची संहिता प्रत्येक शीख व्यक्तीच्या घरी नित्यनेमाने म्हटली जाणारी प्रातःप्रार्थना झाली आहे.

जपुजीच्या आरंभी ‘मूलमंत्र’ नावाचे लहानसे स्तोत्र आहे. त्यात ईश्वराच्या स्वरूपाचे संक्षिप्त वर्णन केलेले आहे. उर्वरित जपुजीत याच मूलमंत्रातील प्रमुख विषयाचा विस्तार आहे.

याखरीज ‘सिधगोष्ट’ अर्थात् ‘सिद्धांशी वा योग्यांशी संवाद’, ‘अशदीवार’, ‘बारमाह’ म्हणजे ‘बारा महिन्यांचे गीत’ इ. रचना आहेत. ह्या सर्व काव्यरचना त्यांनी संगीतातील विविध रागांत निबद्ध केलेल्या आहेत.

उत्तमोत्तमाचा स्वीकार

त्यांनी इस्लाम धर्मामधील एकेश्वरवाद, ख्रिस्तीधर्मातील ईशकृपेची कल्पना आणि हिंदूधर्मातील आत्म्याच्या अमरत्वाची कल्पना यांचा आपल्या शीखधर्मात स्वीकार केला आहे.

‘यदायदाहि धर्मस्य…. संभवामि युगेयुगे’ या गीतावचनाप्रमाणे आवश्यकतेनुसार ईश्वर पृथ्वीवर मानवरूपात अवतार घेतो ही हिंदूंची अवतार कल्पना मात्र त्यांना मान्य नाही.

समारोप

एक शांतीदूत, प्रेम व विश्वबंधुत्वाचा पुरस्कर्ता, मानवतेचा पूजक म्हणून नानकदेवांनी केलेले कार्य व स्थापित केलेला शीख धर्म महत्त्वपूर्ण आहे. त्या माध्यमातून त्यांनी केवळ सदाचार संपन्न असा नवा धर्मच स्थापन केला नाही, तर उत्तर भारतातील जातिव्यवस्था, अस्पृश्यता, सतीची चाल, मूर्तिपूजा, पुरोहितवर्गाने लादलेले जाचक कर्मकांड, वाईट अनिष्ट रूढी इ. विरुद्ध सतत लढा देऊन सामाजिक क्रांतीही घडवून आणली.

संगत व लंगर

‘संगत’(धर्मसंघ) व ‘लंगर’(अन्नदान, अन्नछत्र) ह्यांचा त्यांनी पाया घालून त्यांद्वारे जातिधर्मातील भेदाभेद दूर करण्याऱ्या प्रत्यक्ष आचरणात्मक सामाजिक परंपरेस आरंभ केला. आजही समता व लोकशाही पद्धतीचा उत्तम आदर्श म्हणून ह्या दोन संस्थांचा उल्लेख अनिवार्य आहे.

गुरु नानकदेवांना शतशत नमन!!!!!

वाहे गुरु, वाहे गुरु ।

सतनाम वाहे गुरु l

(५ नोव्हें. २०२५ त्रिपुरी पौर्णिमा)

© श्री  दिवाकर बुरसे

पुणे

संपर्कः ९२८४३००१२५, ९५५२६२९२४५

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ अखेरची कविता… – लेखक : श्री मंगेश मंत्री ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

? इंद्रधनुष्य ? 

☆ अखेरची कविता… – लेखक : श्री मंगेश मंत्री ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित 

१४ डिसेंबर, १९७७ रोजी ‘आधुनिक वाल्मिकी’ असा गौरव झालेल्या गदिमांचे अचानक देहावसान झाले. त्यांचे चिरंजीव शरतकुमार यांनी गदिमा व त्यांचा काळ रेखाटणारे ‘कळशीच्या तीर्थावर’ हे पुस्तक लिहिले आहे. ‘ब्लू बर्ड’ने नुकत्याच प्रकाशित केलेल्या या पुस्तकातील माडगूळकरांच्या अखेरच्या कवितेची ही हेलावून टाकणारी हकीकत.

रात्रीचे आठ वाजून गेलेले होते. टेलिफोनची बेल खणखणली. आपल्या दुखऱ्या छातीवर एक हात धरून पप्पांनी रिसीव्हर उचलला. मघापासून बाहेर येऊ पाहणारी खोकल्याची उबळ थोपवत त्यांनी रिसीव्हर कानाला लावला, ”हॅलो…! ”

दुसरीकडून आवाज आला, ”हॅलो, स्वामी आहेत काय? मी पी. एल. (पु. ल. देशपांडे) बोलतोय. ”

”बोला बोला! काय खबरबात? ”

”तुमची तब्येत कशी काय? बरेच दिवसांत गाठभेट नाही. ”

”आमच्या तब्येतीची रडकथा नेहेमीचीच आहे. नवीन काय काढलंत? ”

”गेल्या महिन्यात बाबा आमट्यांची गाठ पडली होती. त्या उभयतांनी तुमची खूप आठवण काढली. म्हणाले, ‘कविश्रींचे पाय अजून ‘आनंदवना’ला लागले नाहीत. एकवार त्यांच्या येण्याचा योग घडवून आणा. ‘ तिथं बाबा आणि साधनाताई यांनी एक ‘आनंदमेळावा’ योजला आहे. ”

”त्या थोर पुरुषाचं आमंत्रण कशाला पाहिजे? माझी फार इच्छा आहे येण्याची. पण प्रकृतीनं इथं अगदी जायबंदीच करून ठेवलंय मला. ”

”बाबांनी तुमच्याकडं एक मागणी केलीय. ‘आनंदमेळ्या’साठी त्यांना एक गाणं लिहून पाहिजेय तुमच्याकडून. तुमच्या वतीनं मी होकार देऊन बसलोय. मग कधी देताय? ”

”पीएल्, माझी प्रकृती धडधाकट असती तर तुला मी फोनवरसुद्धा ओळी सांगितल्या असत्या. प्रयत्न करतो. त्या महात्म्याला नकार देणं महाकर्मकठीण. ”

”उदईक सेवकास धाडतो, लेखनाचा कागुद आणण्यासाठी. ”

संभाषण संपलं. रात्रीत जागून पपांनी एक सुरेखसं गाणं लिहिलं. नव्या पिढीचं प्रतीक म्हणून ‘बालतरूची पालखी’ काढण्याची बाबांची अभिनव कल्पना पपांना इतकी आवडली की, त्यांनी त्याला साजेसं गीत सहज लिहून हातावेगळं केलं. इतकंच नव्हे तर दुसऱ्या दिवशी फोनवरच ते पी. एल्. देशपांड्यांना ऐकवलं. मुखडा ऐकताच पी. एल्. ची कळी खुलली. ते गाणं होतं नवागताच्या स्वागताचं :

*

कोवळ्या रोपट्या, आज तू पाहुणा

भूषवी अंगणा येऊनिया।

*

माणसाची प्रीती घेई रे संगती

मानाचा अतिथी आमुचा तू।

*

श्यामसुंदराच्या देहुड्या ढंगात

येइ या घरात आनंदाने।

*

आनंदाचा नाद मंजुळ संगीत

शाखापल्लवात घेऊनी ये।

*

कोवळ्या पानात तुझिया नवीन

सूर्याचे किरण नाचू देत।

*

वनाचा वल्लभ नाचताहे वारा

देई उपहारा गीताचा त्यां।

*

वर्षतो श्रावण आशीर्वाद त्याचा

मुकुट माथीचा होवो तुज।

*

इंदपुरीतून धारा वर्षताती

पडू दे त्या माथीं पानांवर॥

*

पपांच्या सिद्धहस्त लेखणीतून उतरलेलं हे शेवटचंच गीत. या गाण्यासाठी त्यावेळी आग्रह धरणाऱ्या पी. एल्. ना मात्र या अदृष्टाची यत्किंचितही चाहूल नसावी. अवघ्या चार-पाच दिवसांनी असं काही घडेल आणि पपांचा अखेरचा निरोप घ्यावा लागेल, अशी पुसटशीही जाणीव त्यांना शिवलेली नसावी.

┉❀꧁꧂❀┉

लेखक : श्री मंगेश मंत्री

प्रस्तुती : श्री सुहास रघुनाथ पंडित 

सांगली (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares