मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “त्या “काहीच” मध्येच सगळं दडलंय…” – माहिती संग्राहक : अज्ञात ☆ सुश्री प्रभा हर्षे ☆

सुश्री प्रभा हर्षे

? इंद्रधनुष्य ?

☆ “त्या “काहीच” मध्येच सगळं दडलंय” –  माहिती संग्राहक : अज्ञात  ☆ सुश्री प्रभा हर्षे

घरी “काहीच करत नाही” अशा स्त्रियांना समर्पित —

जिथे त्या “काहीच” मध्येच सगळं दडलंय…

स्पेनमधील टोरेलाव्हेगा या शहरात एक विलक्षण कांस्य शिल्प उभं आहे — — 

एका स्त्रीच्या पाठीवर संपूर्ण घराचं ओझं ठेवलेलं : वॉशिंग मशीन, पोछे, बादल्या, इस्त्रीची पाटी आणि अजून बरेच काही. कलाकार मेर्सिडिज फिमेनिया यांनी घडवलेलं हे सार्वजनिक शिल्प “ला मुझेर डेल डिटर्जेंटे” (दि डिटर्जंट वुमन) नावाने ओळखलं जातं… 

… हे जगभरातील महिलांनी रोज करीत असलेल्या — दिसत नाही, पैसे मिळत नाहीत, पण घर चालवण्यासाठी अत्यावश्यक असलेल्या — तिच्या सर्व कामांना अर्पण केलेलं स्मारक आहे: स्वयंपाक, साफसफाई, मुलांची देखभाल, घरव्यवस्थापन… अनेकदा घरातल्या कोणत्याही व्यक्ती कडून कौतुक किंवा विश्रांतीशिवाय…

… हे शिल्प एक सार्वत्रिक सत्य सांगतं: “घरी काहीच करत नाही” या वाक्याच्या मागे खरं म्हणजे ती सगळंच करते — घर सांभाळण्यापासून ते भावनिक तें कणखर आधार बनण्यापर्यंत…

 

– – – हे फक्त कला नाही तर जगाला दिलेला संदेश आहे — अदृश्य कामाची किंमत ओळखण्याचा आणि योग्य सन्मान देण्याचा. ती काहीच करत नाही” म्हणणं थांबवूया — आणि “ती सगळं करते” असं म्हणूया.. प्रत्येक आईसाठी…

 

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती : सुश्री प्रभा हर्षे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “सौंदर्य : शरीराचे आणि मनाचे” – लेखिका : श्रीमती भावना ☆ प्रस्तुती – सौ. शोभा जोशी ☆

सौ. शोभा जोशी 

? वाचताना वेचलेले ?

☆ “सौंदर्य : शरीराचे आणि मनाचे” – लेखिका : श्रीमती भावना ☆ प्रस्तुती – सौ. शोभा जोशी ☆

एक अतिशय सुंदर महिलेने विमानात प्रवेश केला आणि आपली सीट शोधण्यासाठी इथे-तिथे नजर फिरवली.

तिला दिसलं की तिची सीट दोन्ही हात नसलेल्या एका व्यक्तीच्या शेजारी होती.

त्या अपंग व्यक्तीजवळ बसायला तिला संकोच वाटला.

ती ‘सुंदर’ महिला एअरहोस्टेसला म्हणाली,

“मी या सीटवर आरामात प्रवास करू शकणार नाही, कारण माझ्या शेजारी बसलेल्या व्यक्तीला दोन्ही हात नाहीत. ”

तिने सीट बदलण्याची विनंती केली.

 

हे ऐकून एअरहोस्टेस थोडी अस्वस्थ झाली आणि तिने विचारलं —

“मॅडम, कृपया कारण सांगाल का? ”

त्या महिलेने उत्तर दिलं—

“मला असे लोक आवडत नाहीत. अशा व्यक्तीजवळ बसून मी प्रवास करू शकत नाही. ”

दिसायला सुशिक्षित आणि सभ्य वाटणाऱ्या महिलेचे हे शब्द ऐकून एअरहोस्टेस अचंबित झाली.

महिलेने पुन्हा ठामपणे सांगितलं—

“मी त्या सीटवर बसणार नाही, मला दुसरी सीट द्या. ”

एअरहोस्टेसने आजूबाजूला पाहिलं,

पण इकोनॉमी क्लासमध्ये एकही सीट रिकामी नव्हती.

ती म्हणाली —

“मॅडम, येथे सीट उपलब्ध नाही, पण प्रवाशांच्या सोयीची जबाबदारी आमची आहे. मी कॅप्टनशी बोलते, कृपया थोडा संयम ठेवा. ”

थोड्या वेळाने परत येऊन ती म्हणाली —

“मॅडम, तुम्हाला झालेल्या असुविधेबद्दल आम्ही दिलगीर आहोत.

या संपूर्ण विमानात फक्त एकच सीट रिकामी आहे — ती फर्स्ट क्लासमध्ये.

आमच्या कंपनीच्या इतिहासात पहिल्यांदाच

इकोनॉमीमधील प्रवाशाला फर्स्ट क्लासमध्ये पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ”

हे ऐकून त्या ‘सुंदर’ महिलेला खूप आनंद झाला.

पण ती काही बोलणार इतक्यातच…

एअरहोस्टेस त्या अपंग व्यक्तीकडे गेली आणि आदराने म्हणाली —

“सर, आपण फर्स्ट क्लासमध्ये जाल का?

कारण आम्हाला नाही वाटत की आपण एखाद्या असभ्य प्रवाशासोबत प्रवास करून त्रास सहन करावा. ”

हे ऐकताच संपूर्ण विमानात टाळ्यांचा कडकडाट झाला.

 

ती अतिशय सुंदर दिसणारी महिला आता लाजेने मान खाली घालून बसली होती.

तेव्हा तो अपंग माणूस उभा राहून म्हणाला,

“मी एक माजी सैनिक आहे. कश्मीर सीमेवरील एका ऑपरेशनदरम्यान

बॉम्बस्फोटात माझे दोन्ही हात गेले.

सुरुवातीला या देवींचे शब्द ऐकून मला वाटले —’मी नेमके कोणाच्या सुरक्षिततेसाठी माझे हात गमावले? ‘

पण आज तुम्हा सर्वांची प्रतिक्रिया पाहून

मला स्वतःचा अभिमान वाटतो की मी माझ्या देशासाठी आणि देशवासीयांसाठी माझे दोन्ही हात गमावले. ” असे म्हणून ते फर्स्ट क्लासमध्ये गेले.

ती ‘सुंदर’ महिला मात्र पूर्णपणे अपमानित होऊन आपल्या सीटवर शांत बसून राहिली.

मर्म : विचारांमध्ये उदारता नसेल तर केवळ सुंदरतेला काहीच मूल्य नसते.  

लेखिका: श्रीमती भावना

प्रस्तुती: सौ. शोभा जोशी 

मो ९४२२३१९९६२ 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “गणित म्हणजे नक्की काय?” ☆ श्री जगदीश काबरे ☆

श्री जगदीश काबरे

☆ “गणित म्हणजे नक्की काय?☆ श्री जगदीश काबरे ☆

गणित म्हणजे नक्की काय? संख्या म्हणजे काय? आणि अनुभवाशिवाय गणित कसे उभे राहते? हे प्रश्न प्रथमदर्शनी कठीण वाटतात, पण थोडा विचार केला तर ते प्रश्न कठीण नसतात हे आपल्या लक्षात येईल. गणित म्हणजे केवळ आकड्यांच्या बेरीज-वजाबाकीचे शास्त्र नाही; तर ते त्याहून खूप व्यापक आहे. आपण म्हणतो ते ‘तीन’, ‘दहा’, ‘शंभर’ हे आकडे स्वतः वस्तू नसतात. ‘तीन’ हा आकडा दिसत नाही; दिसतात त्या तीन वस्तू. उदा. तीन सफरचंद, सात दगड आपण त्या वस्तूंच्या मोजणीतून ‘तीन’ म्हणजे किती, ’सात’ म्हणजे किती, ही कल्पना तयार करतो. म्हणजे संख्या ही प्रत्यक्ष जगात दिसणारी वस्तू नाही, पण मनाने बनवलेली एक समजूत, एक अमूर्त कल्पना आहे. गणित अशाच अनेक अमूर्त कल्पनांचा वापर करून उभे राहते. गणिताविषयी विचार करताना सर्वप्रथम समोर येतो तो त्याच्या स्वरूपाचा प्रश्न. गणित हे केवळ संख्यांविषयीचे शास्त्र आहे अशी सोपी व्याख्या अपुरी ठरते, कारण संख्या हा गणिताचा एक भाग असून संपूर्ण गणिताची व्याप्ती त्यापेक्षा फार मोठी आहे. संख्या स्वतः इंद्रियगोचर वस्तू नसतात; आपल्याला त्यांचे प्रत्यक्ष संवेदन होत नाही. म्हणून गणित हे मूलत: अशा अमूर्त संकल्पनांचे, त्यांच्यातील संबंधांचे आणि त्या संबंधांतील सुसंगततेचे शास्त्र आहे असे म्हणावे लागते. या अमूर्तपणामुळेच गणित अनुभवावर अवलंबून नसते, तर ते ‘निगमी’ म्हणजेच न्यायनिष्ठ, कडक तर्काच्या आधारावर उभे राहते.

गणितातील निगमनपद्धतीची सुरुवात मूलविधाने म्हणजे गृहीतके (axioms) यांच्यापासून होते. ही मूलविधाने आपण थेट इंद्रियानुभवावर आधारून घेत नाही. ती आपण ‘मान्य’ करतो, कारण त्यांत विरोधाभास नाही, त्यांच्यापासून निघणारी तर्कसंगत बांधणी शक्य आहे, आणि ती संपूर्ण प्रणाली एकसंध ठेवतात. याचा अर्थ ती ‘प्रमाण’ आहेत म्हणून स्वीकारलेली नसतात, तर ती गृहितके असून त्यांचा योग्य तर्काने विस्तार करता येतो हेच त्यांचे प्रामाण्य. मूलविधानांचे प्रामाण्य समजण्याचा निकष म्हणजे अंतर्गत सुसंगती, विरोधाभासाचा अभाव आणि तर्कशुद्ध सुसंगती असतात. मूलविधानांपासून एखादा सिद्धान्त ‘अनिवार्यपणे’ निष्पन्न होतो का हे आपल्याला शुद्ध तर्कविचाराने कळते; अनुभवापेक्षा विचारशक्ती इथे निर्णायक ठरते. म्हणजे गणिताची पद्धत अनुभवावर आधारित नसते. गणितातील सिद्धान्त हे ‘मी पाहिले त्यामुळे खरे’ असे नसून ‘मी तर्काने सिद्ध केले त्यामुळे खरे’ असे असते. यासाठी गणित काही मूलविधाने (axioms) ठरवते. ही मूलविधाने जगात खरी आहेत म्हणून आपण घेतो की त्यावर सुसंगत गणित बांधता येते म्हणून घेतो? उदा. ’सपाट पृष्ठभागावर दोन सरळ रेषा एकमेकांना एकाच बिंदूत छेदतात’, हे मूलविधान आपण शाळेत शिकतो. आपण ते गृहित धरतो आणि त्यातून तर्क लावून पुढची संपूर्ण भूमिती उभी करतो. हे मूलविधान शाब्दिक अर्थाने ‘सिद्ध’ नसते; तर ती विश्वाची एक ‘तर्कशुद्ध मांडणी’ आहे. तिच्यावर उभारलेल्या पद्धतीमध्ये विरोधाभास निर्माण होत नाही. हा विरोधाभास नसणे आणि सुसंगती टिकणे हेच ते मूलविधान “बरोबर” असल्याचे निकष आहेत.

तर मग प्रश्न असा उरतो की अशा अमूर्त, विचाराधिष्ठित गोष्टी माणूस समजू कसा लागला? त्यासाठी एक विशिष्ट मानसिक क्षमता असावी लागते. ज्या प्रकारे आपण भाषेमध्ये व्याकरणाचे नियम धरतो आणि वाक्ये तयार करतो, त्याचप्रमाणे गणितामध्ये मन अमूर्त नियम धरते आणि त्यावर आधारित तर्कबद्ध बांधणी करते. ही क्षमता केवळ गणितापुरती मर्यादित नाही, तर तर्कशास्त्र, विज्ञान, भाषा, संगीताची रचना, कायदे, दैनंदिन विचारसरणी अशी सगळीकडे ती दिसते. यामुळे पुढचा प्रश्न निर्माण होतो की अशी तर्कशक्ती किंवा गणनशक्ती मनात आहे ती नेमकी काय आहे? गणिताला आधारभूत अशी काही विशेष ज्ञानशक्ती मनात आहे का? हा प्रश्न दीर्घकाळ तत्त्वज्ञानी परंपरेत चर्चिला गेला आहे. प्लॅटोने गणितीय सत्यांना अनुभवापलीकडील जगातील शाश्वत सत्ये म्हटले; कांटने गणिताला मानवी ज्ञानेच्छेची पूर्वअट (a priori form of intuition) मानले; तर आधुनिक तत्त्वज्ञान गणिताला भाषा आणि तर्क यांच्या संरचनेतून निर्माण होणारी सुसंगत व्यवस्था म्हणते. या सर्वांचा सामायिक आधार असा की गणितातील क्षमता ही माणसाच्या चिंतनशक्तीत म्हणजे अमूर्त तर्कशक्तीमध्येच निवास करते. ही शक्ती फक्त गणितापुरती मर्यादित नाही; ती भाषा, सौंदर्यनिर्णय, विज्ञानातील प्रारूपे, कायद्यातील तर्कबद्धता, दैनंदिन निर्णयपद्धती यांमध्येही दिसून येते. म्हणून गणित ही मनाची फक्त एक विशेष क्षमताच नव्हे, तर मनाच्या एकूण तर्कक्षमतेचे सर्वाधिक शुद्ध आणि स्वच्छ रूप आहे.

गणित आणखीन अद्भुत वाटण्याचे कारण म्हणजे निसर्गातील नियमसुद्धा गणितानेच अचूकपणे समजतात. गुरुत्वाकर्षण, प्रकाशाचा वेग, आवर्तने, कणांचे वर्तन, या सर्व भौतिक जगातील घटना गणिती समीकरणांनी सुंदरपणे स्पष्ट होतात. म्हणजे आपण डोक्यात तयार केलेली तर्कशुद्ध अमूर्त रचना आणि विश्वातील प्रत्यक्ष घडणारे नियम यांत एक विलक्षण साधर्म्य आढळते. हा केवळ योगायोग नाही. निसर्ग स्वतःच काही ठराविक नमुन्यांनी, नियमांनी आणि नियमिततेने भरलेला आहे. आणि मानवी मेंदूला नमुने शोधण्याची, नियम ओळखण्याची, त्यांना पकडून मांडण्याची क्षमता आहे. म्हणून गणित व निसर्ग हे दोन वेगवेगळे नसून एकमेकांना प्रतिबिंबित करणारे आहेत. गणिताचा आश्चर्यकारक भाग म्हणजे त्याचे सृष्टीतील उपयोजन. भौतिकशास्त्रातील मूलभूत घटक—अणू, कण, बल, ऊर्जा—यांचे वर्णन आपण गणिती समीकरणांत करतो. विश्वातील हालचाली, रचना, बदल, आवर्तने, अपघात सगळे काही गणिती नियमांशी जुळून येते. हा केवळ योगायोग आहे का? गणित शिकवते ते मनाचे अमूर्त तर्करूप, आणि निसर्ग चालतो तो गणिताशी सुसंगत नियमांनी! हे आश्चर्य अनेक विचारवंतांनी ‘unreasonable effectiveness of mathematics in natural sciences’ या नावाने चर्चिले आहे. या आश्चर्याचे उत्तर असे की, निसर्ग आपल्याला एका विशिष्ट प्रकारे आढळतो आणि त्या आढळण्यातले नमुने, पुनरावृत्ती, नियमितता ओळखण्यासाठी आपण वापरतो ते साधन म्हणजे गणित. निसर्गात रचना आहे, आणि त्या रचनेला समजून घेण्यासाठी गणित उपयुक्त ठरते; म्हणून गणित आणि निसर्ग यांचे नाते योगायोगांमुळे नसून मानवी संज्ञानशक्ती आणि निसर्गातील संरचना यांच्यातील ते सामंजस्य आहे.

याहून पुढे एक मनोरंजक प्रश्न असा विचारला जातो की दुसऱ्या काही वेगळ्या प्रकारच्या विश्वाची कल्पना केली, जिथे नियम वेगळे आहेत तरी गणित लागू होईल का? उत्तर आहे, होय. कारण गणित म्हणजे निव्वळ विशिष्ट गोष्टींचे मोजमाप किंवा आकार नव्हे; तर गणित म्हणजे कोणत्याही गोष्टीतील तर्कशुद्ध संबंध समजून घेण्याची भाषा. विश्व वेगळे असले तरी त्यात काही ना काही प्रकारचे संबंध, बदल, परस्पर नाते असणारच, आणि त्यांना समजावून सांगणारी भाषा म्हणून वेगळे गणित उभे राहीलच. अर्थात, जर एखाद्या भिन्न प्रकारच्या विश्वाची कल्पना केली—जिथे नियम भिन्न आहेत—तरीही काही प्रकारचे ‘गणित’ तिथे असणारच. कारण गणित म्हणजे कोणत्याही सुसंगत प्रणालीतील संबंधांचे तर्कशास्त्र. विश्व कोणतेही असले तरी त्यातील घटक एकमेकांशी कसे संबंधित आहेत याची भाषा गणितच ठरवते. त्यामुळे गणित हे निसर्गाच्या बाहेरचे नाही, तर निसर्गातील रचना समजावून घेण्याची मानवी क्षमता आहे. ते मन आणि विश्व यांना सांधणारा एक पूल आहे. गणित ही अमूर्ततेतून उगवणारी पण जगातील प्रत्यक्ष प्रक्रियांना अचूक पकडणारी एक अद्वितीय विचारपद्धती आहे.

म्हणजे असे की, प्राचीन ग्रीक गणितज्ञ युक्लिडने जी भूमिती शोधली ती सपाट पृष्ठभागासाठी लागू होणारी होती. या भूमितीला ’युक्लीडियन भूमिती’ असे म्हणतात. त्यामुळे त्याची जी गृहीतके होती ती फक्त सपाट पृष्ठभागाच्या गणितालाच लागू होत होती. अठराव्या शतकात रशियन गणितज्ञ लोबोशोवस्की आणि जर्मन गणितज्ञ रिमान यांनी विश्वाचा विचार केला तेव्हा विश्वास सपाट असे नसतेच तर संपूर्ण विश्व हे गोल असते, हे लक्षात घेतल्यामुळे त्यांनी एका नवीन भूमितीचा शोध लावला, ज्याला आपण ’अयुक्लिडियन भूमिती’ म्हणतो. या दोन भूमितीतील फरक एका साध्या सोप्या उदाहरणाने स्पष्ट होईल. युक्लीडन भूमितीमध्ये त्रिकोणाच्या तीन कोनांची बेरीज 180⁰ असते; तर अयुक्लिडीयन भूमितीमध्ये त्रिकोणाच्या तीन कोनांची बेरीज कधी 180° पेक्षा जास्त असते तर कधी 180° पेक्षा कमी असते. कारण युक्लिड भूमितीमध्ये तीन सरळ रेषा एकमेकींना छेदतात तर अयुक्लिडीय भूमितीमध्ये तीन वक्ररेषा दोन प्रकारे एकमेकींना छेदू शकतात. त्यामुळे दोन्ही प्रकारच्या भूमितीमध्ये वेगवेगळे निष्कर्ष निघतात आणि ते त्या त्या भूमितीच्या गृहीतकांनुसार योग्यच ठरतात.

22 डिसेंबर हा भारतीय गणितज्ञ रामानुजन यांच्या स्मरणार्थ “राष्ट्रीय गणित दिवस” म्हणून साजरा केला जातो. पण आपल्यापैकी किती लोकांना रामानुजन यांच्या गणिताविषयी माहिती आहे? रामानुजन यांच्या गणिताची प्रमुख वैशिष्ट्ये म्हणजे विलक्षण तर्कज्ञान, औपचारिक पुराव्यांपेक्षा संकल्पनात्मक सत्यावर असलेला त्यांचा विश्वास आणि अत्यंत मौलिक सूत्रनिर्मिती. पारंपरिक शिक्षणाच्या मर्यादा असूनही त्यांनी संख्याशास्त्र, अनंत श्रेणी, अपूर्णांकातील सातत्य, विभाजीत संख्यांचा अभ्यास आणि मॉड्युलर फॉर्म्स या क्षेत्रांत क्रांतिकारक काम केले. अनेकदा कोणताही सविस्तर पुरावा न देता त्यांनी थेट निष्कर्ष मांडले. पुढे आधुनिक गणितज्ञांनी ते निष्कर्ष अत्यंत काटेकोर पुराव्यांनी सिद्ध केले. यावरून त्यांच्या तर्कज्ञानाची प्रखरता स्पष्ट होते. गणित केवळ तर्कशुद्ध गणना नसून एक सर्जनशील, कलात्मक अनुभूती आहे, अशी त्यांची दृष्टी त्यांच्या कामातून दिसून येते.

रामानुजन यांच्या गणिताचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे साध्या दिसणाऱ्या संख्यात्मक नमुन्यांतून खोल सार्वत्रिक नियम शोधण्याची क्षमता. टाऊ फंक्शन, रामानुजन प्राइम्स, आणि π (पाय) साठीच्या अनंत श्रेणी यांसारख्या त्यांच्या सूत्रांनी संख्याशास्त्राला नवी दिशा दिली. त्यांच्या नोंदवह्यांमध्ये आढळणारी असंख्य सूत्रे आणि आयडेंटिटीज हे केवळ स्वतंत्र निष्कर्ष नसून परस्परांशी सूक्ष्म नातेसंबंध दर्शवतात, जे आधुनिक गणितातील मॉड्युलर फॉर्म्स आणि ऑटोमॉर्फिक फंक्शन्सच्या विकासात अत्यंत महत्त्वाचे ठरले. तसेच रामानुजन यांच्या गणिताची वैशिष्ट्ये त्यांच्या कार्यपद्धतीतही दिसून येतात. कठोर पद्धतशीर प्रशिक्षणाऐवजी त्यांनी स्व-अभ्यास, प्रयोगशीलता आणि मानसिक गणना यांवर भर दिला. त्यामुळे त्यांच्या गणितात एक प्रकारची धाडसी अपारंपरिकता आढळते, जी त्या काळातील प्रस्थापित गणिती परंपरेपेक्षा वेगळी होती. आजही रामानुजन यांचे कार्य केवळ ऐतिहासिक महत्त्वाचे नाही, तर समकालीन गणित, सैद्धांतिक भौतिकशास्त्र आणि संगणकीय गणितासाठी प्रेरणास्रोत ठरत आहे, हेच त्यांच्या गणिताच्या वैशिष्ट्यांचे अंतिम द्योतक मानले जाते.

अशा प्रकारे बघताना गणित हे संख्यांचे शास्त्र नसून तर्क, रचना, सुसंगती आणि संबंध यांचे शास्त्र आहे, हे लक्षात येते. संख्या हे त्यातील एक प्रकरण, परंतु गणिताचे अधिष्ठान म्हणजे मानवी विचारशक्तीची अमूर्त बांधणी करण्याची क्षमता. अनुभवाची गरज नसतानाही गणित उभे राहते, आणि अनुभवाच्या आधारानेही ते सिद्ध होते. यातच त्याची वैश्विकता आहे. गणित हे मनाला आणि निसर्गाला जोडणारे सर्वात सूक्ष्म आणि सर्वात शक्तिशाली साधन आहे. म्हणून सारांश असा की, गणित हे संख्यांचे किंवा आकारांचे शास्त्र नसून संबंध, रचना, नियम आणि तर्क यांचे शास्त्र आहे. संख्या, आकार, समीकरणे ही त्याची साधने आहेत; परंतु त्यामागील मूलभूत शक्ती म्हणजे मानवाची अमूर्त विचार करायची क्षमता. म्हणूनच गणित आपल्याला दिसत नाही, पण संपूर्ण विश्व समजण्याची किल्ली मात्र गणितच देत राहते.

© श्री जगदीश काबरे

(लेखक विज्ञान आणि वैज्ञानिक दृष्टीकोन प्रसारक आहेत.)

jetjagdish@gmail. com

मो ९९२०१९७६८०

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ मोरुचा पापा… ☆ श्री मकरंद पिंपुटकर ☆

श्री मकरंद पिंपुटकर

??

☆ मोरुचा पापा… ☆ श्री मकरंद पिंपुटकर 

काल एका कामासाठी मी माझ्या गावी – उंबरगावला आलो होतो, मित्राकडे उतरलो होतो आणि आत्ता आज सकाळी त्याच्यासोबत त्याच्या घरून निघालो होतो.

निघताना, चेष्टेत मी त्याला विचारलं, “मोरुचा पापा” घेतलास ना रे? ” 

त्याचा चेहरा पडला, मला जवळजवळ खेचतच तो म्हणाला, “आधी इथून निघू या, मग तुला सांगतो. “

मी काय विचारत होतो ते तुला बहुधा कळलं नसावं, म्हणून मी त्याला समजावत म्हणालो, “अरे, हा खूप जुना शब्द आहे. मो – रु – चा – पा – पा म्हणजे मोबाईल, रुमाल, चावी, (रेल्वे / बसचा) पास, पाकीट – हे सगळं घेतलंस ना, एवढंच विचारत होतो मी !”

माझं एवढं बोलणं होईपर्यंत, लिफ्टने आम्ही इमारतीच्या तळमजल्यावर आलो होतो, आतापावेतो तो थोडा relax झाला होता. म्हणाला, “अरे हो, मला ठाऊक आहे मोरुचा पापा म्हणजे काय ते. मोबाईल येण्यापूर्वी यालाच पेरूचा पापा म्हणत – पे म्हणजे पेन अशा अर्थाने. पण, तू हा प्रश्न विचारलास तेव्हा बायको जवळच होती, तिने माझ्या विसरभोळेपणाबद्दल प्रवचन दिलं असतं, आणि मोरुचा पापा काय, मीच कसा मोरू आहे हे तुला सांगितलं असतं, म्हणून मी तुला तिथून अर्जंट बाहेर काढलं. “

त्याच्या या स्पष्टीकरणाने मी आणखीनच गोंधळात पडलो. माझ्या चेहऱ्यावरचे भाव पाहून तो मला समजावून सांगू लागला.

– – “गेल्या वर्षीची गोष्ट. कंपनीच्या कामासाठी मला मुंबईहून विमानाने चेन्नईला जायचे होते. (उंबरगाव हे पश्चिम रेल्वेवर, मुंबई अहमदाबाद रेल्वेमार्गावर गुजरातमधील पहिले रेल्वे स्टेशन आहे. मुंबईपासून साधारण १५० किलोमीटर दूर) महत्त्वाचे presentation होते आणि साहेबांनी माझ्यावर ही जबाबदारी टाकली होती.

मुंबईहून सकाळी ११:३० ची फ्लाईट होती, उंबरगावहून सकाळी ६ वाजताच्या वलसाड पॅसेंजर ट्रेनने निघावे लागणार होते, म्हणजे ८:३० पर्यंत बोरिवली णि तिथून रिक्षाने विमानतळ गाठायचा होता.

झ्या बायकोला एक चांगली सवय आहे. मला असं लवकर निघायचं असलं की, सकाळच्या घाईगडबडीत काही राहायला नको म्हणून, आदल्याच दिवशी, माझी बॅग भरून ती दाराशीच ठेवते. त्याप्रमाणे तिने माझ्या दोन्ही बॅग्स दाराशीच ठेवल्या होत्या. एक लॅपटॉपची बॅग – ज्यात विमानाचे तिकीटही होते आणि दुसरी बॅग – जिच्यात माझे कपडे, कंपनीची कामाची कागदपत्रं होती. कंपनीने मला हातखर्चासाठी पन्नास हजार रुपये रोख देऊन ठेवले होते, तेही याच दुसऱ्या बॅगेत होते.

सकाळ झाली. मी आन्हिके आटोपून, बायकोने दिलेला गरमागरम चहा पिऊन निघालो. स्टेशनला पोचलो, दहा पंधरा मिनिटांत गाडी आली, बसायला जागा मिळाली, स्थिरस्थावर झालो, गाडीने वेग पकडला, आणि… ” मित्र सांगताना थबकला, आत्ताही हे सांगताना त्याच्या कपाळावर घाम आला होता.

“… आणि माझ्या लक्षात आलं की माझ्या हातात फक्त लॅपटॉपचीच बॅग आहे, माझी कपड्यांची दुसरी बॅग माझ्याकडे नाहीये. मला दरदरून घाम फुटला. मी घरून तर दोन्ही बॅगा घेऊन निघालो होतो. का दुसरी बॅग घरीच राहिली होती?

मी बायकोला फोन लावला. थंडी होती, आज कामाची काही धावपळ नसल्याने ती पांघरुणात मस्त गुरफटून झोपली असणार, झोपमोड केल्याबद्दल ती रागावणार हे ठाऊक होतं, पण पर्याय नव्हता, मी तिला फोन केला.

बराच वेळ रिंग वाजल्यावर पेंगुळलेल्या आवाजात तिनं फोन उचलला. पण माझा प्रश्न ऐकल्यावर तिची झोप पार उडाली. “तू घेतल्या होत्या दोन्ही बॅगा, ” तिने ठामपणे सांगितलं, “पण, थांब क्षणभर, मी खात्री करून घेते, ” ती म्हणाली. दोन सेकंदांत ती पुन्हा फोनवर आली – इथे घरात नाहीये तुझी बॅग, तू नक्की घेऊन गेला आहेस दोन्ही बॅगा. ” तिने ठामपणे सांगितलं.

मी फोन ठेवला. डोक्यात नुसतं वादळ उठलं होतं… ती बॅग स्टेशनावरच राहिली का? का गाडीत चढताना कोणी चोरली?

सगळ्यात मोठा प्रश्न होता – आता काय करायचं? त्या दुसऱ्या बॅगेतल्या कागदपत्रांशिवाय चेन्नईतील माझी मीटिंग शक्य नव्हती. विमान पकडले नाही, चेन्नईला गेलो नाही, तरी फटके होते, शिवाय कंपनीने दिलेल्या पैश्यांचे काय? .. अनेक विचारांनी डोकं नुसतं भंडावून गेलं होतं.

एवढ्यात माझा फोन वाजला, बायकोचा फोन होता, आवाजावरून तिची झोप पूर्णपणे उडाल्याचं स्पष्ट जाणवत होतं. “बाबा रे, तुझी बॅग मिळाली. घराबाहेर लिफ्टसमोर विसरला होतास तू. ” या दोन वाक्यांव्यतिरिक्त तिला अजून बरंच काही सुनवायचं होतं, पण ती संयम बाळगून होती, हे मला जाणवत होतं.

.. माझ्या डोक्यात चक्रं फिरू लागली.

थोड्या वेळाने, ६:३० च्या सुमारास, मी ज्या गाडीत होतो ती वलसाड पॅसेंजर ट्रेन डहाणूला पोचणार होती. डहाणूला मी जर उतरलो, तर तासाभराने, ७:३० वाजता पुढची ट्रेन – फ्लाईंग राणी एक्सप्रेस येणार होती. ही गाडी अंधेरीला – बोरिवलीपेक्षा विमानतळाच्या जास्त जवळच्या स्टेशनला – सकाळी ९:१५ वाजता पोचणार होती, तिथून मला चेन्नईचं विमान पकडणं तांत्रिकदृष्ट्या तरी शक्य होतं.

मी बायकोला म्हटलं, “ती बॅग घे, रिक्षा पकड, आणि डहाणूला ये. मी फ्लाईंग राणी पकडतो आणि पुढे जातो. “

बायको निघाली. आधी आमच्या घराजवळून तिला डहाणूला जायला रिक्षा मिळेना, मग ती पहिल्या रिक्षाने “अकरा मारुती” स्टॉपला पोचली. तिथे तिला डहाणूसाठीची रिक्षातर मिळाली, तो अव्वाच्या सव्वा भाडं मागत होता, पण मौके की नजाकत देखते हुवे तिने ते भाडं मान्यही केलं. पण एवढं झाल्यावर डहाणूच्या दिशेने सुसाट निघण्याऐवजी, हातात पैसे पडल्यावर, त्या रिक्षावाल्याने मोर्चा फिरवला तो cng पंपाकडे.

तिकडे बायको आणि इकडे मी घड्याळावर नजर खिळवून होतो. रिक्षा एकदाची आता डहाणूच्या दिशेने निघाली होती. दरम्यान मी आमच्या कंपनीतल्या डहाणूला राहणाऱ्या राजूला फोन केला. त्याला थोडक्यात हे सगळं सांगितलं, आणि डहाणू रिक्षा स्टँडवर त्याला तयारीत राहायला सांगितलं.

गाडीची वेळ झाली, तरी अजून बायको आणि रिक्षा पोचल्या नव्हत्या. राजूचा मला फोन आला, तो म्हणाला, “ट्रेन आलीच तर तुम्ही चढा आणि opposite बाजूच्या दरवाज्यात येऊन उभे रहा. ” 

माझी ट्रेन २ क्रमांकाच्या फलाटावर येणार होती आणि रिक्षा १ क्रमांकावर. नियमानुसार राजूने जिने चढून २ क्रमांकाच्या फलाटावर येणं अपेक्षित होतं, पण तो बहुधा रुळांवरून उड्या मारून येणार होता.

इकडे फलाटावर गाडी आली, आणि तिकडे रिक्षा डहाणू स्टेशनच्या स्टँडवर शिरली. राजूचा मित्र तिथे तयारीत उभा होताच. रिक्षा थांबण्यापूर्वीच त्याने बायकोकडून बॅग ताब्यात घेतली आणि तो फलाटाकडे धावला. इकडे मी ट्रेनमध्ये चढून दरवाज्यात येऊन उभा राहिलो.

राजूने बॅग घेतली, फलाटावरून रेल्वे रुळांवर तो झेपावला, गाडी हलली होती, बॅग उंचावत तो माझ्या दाराकडे आला, मी बॅग ताब्यात घेतली आणि सुस्कारा सोडला.

मी आत येऊन जागेवर बसलो, पाच मिनिटं झाली तरी माझ्या छातीत अजून धडधडत होतं. श्वास थोडा नियमित झाल्यावर मी आधी बॅग तपासली. पैसे, कागदपत्रं सगळं व्यवस्थित होतं. मी बायकोला फोन लावला.

ती अजून घुश्श्यात होती. दोन मिनिटं तिनं आधी तिची सगळी भडास काढली, आणि शेवटी म्हणाली, “आता यापुढे तू, तुझी बॅग आणि तुझा विमानप्रवास याबाबत पुन्हा फोन केलास, तर मी काही तो फोन उचलणार नाही. “

तर अशी ही माझ्या विसरभोळेपणाची कथा. तू तो मोरूच्या पाप्याचा प्रश्न विचारून जखमेवरची खपलीच काढत होतास, म्हणून तुला मी घाईगडबडीनं बाहेर काढलं. “

तो सांगत होता, मी त्याचा चेहरा पाहत होतो, आणि खरंच, तो आत्ता अगदी मोरूच दिसत होता.

© श्री मकरंद पिंपुटकर

चिंचवड

मो ८६९८०५३२१५   

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ भारतीय सैन्याचा निडर चेहरा! – भाग – २ ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

☆ “भारतीय सैन्याचा निडर चेहरा!” – भाग – २ ☆ श्री संभाजी बबन गायके

(साहेबांचा जीवाभावाचा साथीदार लान्स नायक आवेश कुमार साहेबांसोबत होता… त्या घरावर अधून मधून एक एक फैर झाडत आवेश कुमार पुढे सरकत होते… सायंकाळचे साडेसहा वाजले होते… अंधार झाल्यावर मोहीम आणखी किचकट व्हायची शक्यता होती.) 

इथून पुढे – —- 

आय. ई. डी. अर्थात इम्प्रोवाईज्ड एक्सप्लोजीव डिवाईस घराच्या दरवाजाजवळ लावायचे… रिमोटने त्याचा स्फोट घडवून आणायचा… त्या घराला भगदाड पडले की त्यातून आत शिरायचे आणि अतिरेक्यांना शोधून ठार मारायचे! अर्थात अतिरेकी सुद्धा प्रशिक्षित असतात… त्यांनी भारतीय सेनेची ही चाल ओळखली… त्यांचा गोळीबार एक मिनिट थांबला… याचाच अर्थ ते दोघे जागा बदलण्याच्या प्रयत्नात होते… स्फोटक लावल्यावर साहेब आणि आवेश कुमार तिथून मागे सरले… कानठळ्या बसवणारा मोठा स्फोट झाला… त्या घराचा दरवाजा उध्वस्त झाला… पण या गडबडीत एक अणकुचीदार दगड उडाला तो थेट मेजर साहेबांच्या हेल्मेटच्या अगदी खालच्या भागात डोक्याला लागला… मोठी जखम झाली… कारण दगडाने नेमकी एक रक्तवाहिनी फोडली होती… आवेश कुमार यांनी साहेबांना तेथून औषधोपचारासाठी हलवण्याचा मनोदय बोलून दाखवताच… साहेबांनी त्यास नकार दिला! एका सैनिकाने त्यांच्या डोक्याला मलमपट्टी केली. पंधरा मिनिटे गेली… वरून पुन्हा दोन रायफली धडाडू लागल्या! अंधार झाला होता. आता आणखी काहीतरी करणे भाग होते! यावेळी मेजर ऋषी साहेबांनी एक वेगळे शस्त्र हाती घेतले… पेट्रोल भरलेल्या आणि त्यात घासलेटमध्ये भिजवलेल्या कापडी वाती. जगभरात हिंसक निदर्शनात हे आयुध भलतेच प्रभावी ठरले आहे.. याला मोलोटोव कॉकटेल म्हणतात! या बाटल्या आत फेकल्या की फुटतील आणि त्यातून निर्माण होणारी आग आणि धूर यांमुळे आत थांबणे अशक्य होईल… अशी योजना होती. बिळात लपलेल्या विषारी सापाला असे धुराने बाहेर काढावे लागते! साहेबांनी पुन्हा घराकडे धाव घेतली… किचनमध्ये एक बाटली फेकली… आतमध्ये आणखी काही बाटल्या फेकल्या… घरातील कारपेट, कापडाने पेट घेतला… आता अतिरेक्यांना दुस-या मजल्यावरून उड्या घेतल्याशिवाय गत्यंतर राहणार नव्हते! त्यांच्या स्वागतास भारतीय रायफल्स सज्ज होत्या! पण त्या घराची आग विझली! हा प्रयत्न वाया गेला होता! आता आणखी काहीतरी केलेच पाहिजे!

मध्यरात्र उलटून गेली होती. कर्नल पांडे साहेबही तिथे पोहोचले होते. ऋषीसाहेबांनी त्या घरात घुसून आणखी आय. ई. डी. लावण्याचा निर्धार केला. डोके रक्ताने भिजलेले… बराच रक्तस्राव झालेला… पण साहेब कुठेही थकलेले दिसले नाहीत… दुस-या कुणाला आय. ई. डी. लावायला आत पाठवावे हा सल्ला त्यांनी मानला नाही… म्हणाले… हे माझे मिशन आहे… मीच संपवणार! हे दोघे अतिरेकी निसटून जाता कामा नयेत!

मेजर ऋषी साहेबांनी पंधरा किलोचे दोन आय. ई. डी. नेण्याचे ठरवले… पहिला आय. ई. डी. हातात घेताच… त्यांना त्यांच्या मातोश्रींची आठवण आली… कसे कुणास ठाऊक त्या मध्यरात्रीही मातोश्री राजलक्ष्मी जाग्याच होत्या… साहेबांनी मोबाईलवरून घरचा नंबर डायल केला… पण त्यांचे बोलणे आईच्या कानांना ऐकूच गेले नाही… पण हृदयाला मात्र गेले असावे!

वरच्या मजल्यावरून येणारा फायर आता सातत्याने येऊ लागला… दोघे आलटून पालटून भयावह गोळीबार करीत होते… साहेब दोन्ही हातात पंधरा पंधरा किलोचे आय. ई. डी. घेऊन सावधपणे पोटावर सरपटत त्या उध्वस्त झालेल्या दरवाज्यातून शिरले… आवेश कुमार सोबत येऊ पहात होते… त्याला त्यांनी बाहेरच थांबायला भाग पाडले.. मोहिमेत त्याला काही झाले तर? त्याच्या घरच्यांना काय सांगणार? सोबतच्या कुणाही जवानाच्या जीविताला धक्का लागणार नाही, अशी खात्रीच साहेबांनी मोहीम सुरु करताना दिली होती.. ! लढ्यात सर्वांत पुढे मीच असणार!

ऋषीसाहेब आत शिरले… तळमजल्यावर एका जागी आय. ई. डी. लावले आणि मागे फिरले… तीस सेकंद होताच स्फोट होणार होता… सुरुवातीला लावलेल्या एका आय. ई. डी. पेक्षा या दोन स्फोटकांचा परिणाम दुप्पट होणार होता… वीस सेकंद झाले आणि ऋषी साहेबांच्या मनात आणखी काहीतरी आले… आपण लावलेले आय. ई. डी. त्या घरात आणखी आत लावले तर अपेक्षित परिणाम साधला जाऊ शकेल… त्यांनी स्फोट घडवून आणू नका असा आदेश दिला!

साहेब सरपटत पुन्हा आत शिरले… ती स्फोटके उचलणार इतक्यात त्या अंधारात वरच्या मजल्यावरून खाली सरकणारी एक सावली त्यांना दिसली… तोंडाच्या अगदी जवळ… रायफल धडाडली… एका गोळीने डोक्यावरचे हेल्मेट उडवून लावले… दुसरी गोळी साहेबांच्या नाकाचा डावा भाग भेदून गेली… तिसरीने जबडा तोडला.. नाक राहिलेच नाही… डोळा अगदी थोडक्यात बचावला… पण डोळयांखालचा चेहराच राहिला नव्हता… त्याही स्थितीत साहेबांनी त्या आकृतीवर एक मोठी फैर झाडली… एक अतिरेकी खतम झाला होता!

बाहेर उभे असलेले आवेश कुमार आत धावले… साहेबांनी त्यांना खुणेनेच थांबवले… दुसरा अतिरेकी अजून जिवंत आहे! तो अतिरेकी खाली येऊ शकतो… त्याचा गोळीबार सुरूच आहे… कवर फायर घेत, आपल्या हातात आपला चेहरा घेऊन मेजर ऋषी रांगत, सरपटत बाहेर आले… ! निसर्गाची किमया म्हणावी… मोठी जखम झालेली शरीराला लगेच जाणवत नाही.. वेदना जणू काहीकाळ थबकून राहतात! एका कोपरावर सरपटत साहेब पुढे आले… एक मीटर उंचीच्या कुंपणावरून त्यांनी स्वत:ला खाली लोटून दिले! आणि उभे राहिले! त्यांना सावरण्यासाठी पुढे आलेल्या सैनिकांनी आ वासला… साहेबांचा चेहरा? तिथे फक्त मांसाचा गोळा होता! प्राथमिक उपचार करण्याच्या पलीकडे परिस्थिती होती… वैद्यकीय साहाय्यक हादरून गेले होते… मेजर साहेबांना लष्करी जीपमधून जवळच्या हेलिपॅडपर्यंत नेण्यात आले… रात्रीची वेळ असल्याने लष्करी वाहने अडवून धरणारे दगडफेकी लोक सुदैवाने तिथे नव्हते… रूग्णालयापर्यंतचा प्रवास वेदनेने चिंब भिजलेला होता… लष्करी रुग्णालयात निरोप गेला होता… ९२, बेस हॉस्पिटल, श्रीनगर येथे मेजर सौ. अनुपमा नायर त्या रात्री ड्युटी करून घरी गेल्या होत्या… आणि ऋषी साहेबांच्या गुड नाईट फोनची प्रतिक्षा करीत होत्या… त्यांनी त्वरीत गणवेश चढवला आणि त्या रुग्णालयात पोहोचल्या.. ! मेजर ऋषी चक्क बसलेल्या अवस्थेत रुग्णवाहिकेतून आले होते… त्यांच्या जखमा पाहून डॉक्टर्स विचारात पडले होते… इथे यावर काहीही उपचार करणे अशक्य आहे… अशी त्यांची खात्री होती.. पण त्याहीपेक्षा तो चेहरा पाहून तेही हबकून गेले होते! मेजर साहेबांनी त्यांना थम्स अप केले! आणि डॉक्टरांचा हात हाती घेतला… जणू सांगत होते… मी ठीक आहे.. मी ठीक होईन.. तुम्ही चिंता करू नका!

डोक्याला झालेल्या जखमेतून आधी झालेला रक्तस्राव आणि आता झालेल्या भयावह जखमांतून होत असणारा रक्तस्राव डॉक्टरांना काळजीत पाडणारा होता. हा रुग्ण बेशुद्ध झाला तर समस्या वाढणार होती. त्याला झालेल्या जखमा जर त्याने पाहिल्या असत्या, त्याला समजल्या असत्या तर त्याचा मानसिक ताण येऊन अधिक रक्तस्राव होण्याची शक्यताही अधिक होती. रक्तस्राव थांबवण्याचे शक्य ते सर्व प्रयत्न झाले आणि दिवस उजाडताच हवाई दलाच्या विशेष विमानाने मेजर साहेबांना दिल्लीच्या लष्करी रुग्णालयात धाडण्यात आले! याच दिवशी पाकिस्तानी अतिरेकी संघटनांनी त्यांचे दोन खासे जिहादी हाफिज मोहम्मद आकीब उर्फ आकीब मौलवी आणि सैफुल्ला उर्फ उसामा हे भारतीय सैन्याकडून मारले गेल्याचे जाहीर केले… मेजर ऋषी यांनी केलेल्या या शिकारी होत्या… एक मोठे यश होते हे!

दिल्लीच्या रुग्णालयात ऋषी साहेबांनी कित्येक दिवस प्रचंड वेदना सहन केल्या… त्यांच्या चेह-यावर तब्बल २८ शस्त्रक्रिया करण्यात आल्या. एका मोठ्या शस्त्रक्रियेनंतर किमान दोन महिने लागायचे त्या जखमा ब-या व्हायला… वेदनांचा लांबचा प्रवास होता हा. त्यांच्या शरीरातील एक हाड काढून ते जबड्यात बसवण्याचाही प्रयत्न झाला. पंचेचाळीस दिवस ते एक शब्दही उच्चारू शकले नाहीत. दातांनी चावून अन्न खाण्याची तर सोयच नव्हती… अन्न रबरी नळीतून पोटात घातले जात होते. पण हे सर्व होत असताना साहेबांचा दिसू शकणारा चेहरा कधी उदास दिसला नाही. इतरांना त्यांच्या त्या भगदाड पडलेल्या चेह-याकडे पाहणेही अवघड होते पण साहेब मनातून पुन्हा काश्मीरमध्ये परतण्याचा विचार करीत होते… कारण सैनिक खरा शोभतो तो रणांगणामध्येच.

मातोश्री राजलक्ष्मी त्यांना भेटायला रुग्णालयात आल्या तेंव्हा त्यांनी एकही शब्द उच्चारला नाही… डोळ्यांतून आसवे गाळली नाहीत… लेकाला वाईट वाटू नये म्हणून. पण पुढे कधीतरी मॉडेलिंगच्या क्षेत्रात नशीब आजमावून बघण्याची स्वप्ने पाहिलेल्या मुलाच्या चेह-याची अशी दुरवस्था पाहून त्या मनातून खचल्या मात्र असतील… पण आपल्या मुलाचा जीव वाचला याचे समाधानसुद्धा त्यांना होतेच. मेजर साहेबांच्या तब्येतीची चौकशी करणारे शेकडो फोन त्राल गावातून केले जात असत… हमारे खान साहब को वापस भेजो.. हम उन्हें ठीक कर लेंगे! अशी आर्जवे लहान मुलं करीत असत… इतका विश्वास ऋषी साहेबांनी प्राप्त करून ठेवला होता!

भारताचे तत्कालीन सेनाप्रमुख आणि पुढे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ पदी विराजमान झालेले दिवंगत बिपीनजी रावत साहेब मेजर ऋषी यांना भेटण्यासाठी रुग्णालयात आले असताना… ऋषी साहेबांच्या डोळ्यांत आसवे तरळली… कारण आपले सेनाप्रमुख उभे आहेत आणि आपण त्यांना उभे राहून सल्यूट करू शकत नाही! मेजर साहेबांची कहाणी समजावून घेतल्यानंतर रावत साहेबांनी उत्स्फूर्तपणे त्यांना ‘सर्वांत नीडर सैनिक’ अशी उपाधी दिली!

ऋषी यांनी या दुखण्यातून सावरण्यासाठी दिवस-रात्र परिश्रम घेतले… आणि सैनिकी सेवेत पुन्हा पाऊल ठेवले… फक्त एकच बदल झाला होता… चेह-याचा हनुवटी ते नाकापर्यंतचा संपूर्ण भाग झाकणारा मुखवटा त्यांनी कायमचा अंगिकारला! हाच मुखवटा परिधान करून त्यांनी सेना मेडल पुरस्कार स्वीकारला!

मेजर साहेबांना बढती मिळून ते लेफ्टनंट कर्नल झाले असून त्यांना काश्मिरात पुन्हा जायची आंतरिक इच्छा आहे… त्राल गाव आणि तेथील नागरीकांवर त्यांचा जीव जडला आहे. सध्या त्यांना त्यांच्या जन्मभूमीची, केरळची राजधानी असलेल्या थिरूवनंतपुरम येथील पान्गोडे लष्करी प्रशिक्षण केंद्राचे प्रमुख म्हणून त्यांची नेमणूक केली गेली आहे. तिथे ते लष्करी जवानांना प्रशिक्षित करत असतात. गेल्या वर्षी ऑगस्ट, २०२४ मध्ये वायनाड गावात भयावह भूस्ख्लन झाले. त्या गावात बचाव कार्य करण्याची महत्त्वपूर्ण कामगिरी लेफ्ट. कर्नल ऋषी राजलक्ष्मी साहेबांच्या नेतृत्वाखाली यशस्वीरीत्या पार पाडली गेली. ऋषीसाहेब स्थानिक जनतेमध्ये, विशेषत: तरुणांमध्ये खूप प्रिय असून ते महाविद्यालये, सामाजिक संस्थांमध्ये अजून स्फूर्तीदायक व्याख्याने देत असतात… त्यांनी त्यांची शरीरसंपदा अतिशय उत्तम राखली असून त्यांच्यापासून युवक प्रेरणा घेत आहेत… काळा मुखवटा (मास्क) परिधान केलेला असला तरी भारतीय सेनेचा हा सर्वांत सुंदर चेहरा राष्ट्रप्रथम भावनेच्या तेजाने लखलखत असतो… जयहिंद साहेब… तुम्ही ऋषी आहात.. तुम्हांला राजलक्ष्मी प्रसन्न आहे… आणि नायर म्हणजे नायक हे कुलनाम तुम्ही यथार्थ ठरवलेले आहे! खूप खूप शुभेच्छा!

– समाप्त –

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ चुलीभोवती साकारलेले भाषिक ‘ऐश्वर्य’… – लेखक: डॉ. केशव स. देशमुख ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

? वाचताना वेचलेले ?

☆ चुलीभोवती साकारलेले भाषिक ‘ऐश्वर्य’… – लेखक: डॉ. केशव स. देशमुख ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित 

बोली काय अथवा भाषा काय, ती एकठायी अशी नसते. तिच्या उगमाचं अचूक स्थान सांगता येत नाही. तथापि, अनुमानानं भाषेचा शोध नोंदवता येतो. तशा नोंदी अनेक चिंतकांनी मांडून भाषेच्या वाटा दाखवलेल्या आहेत. पण हे अंतिम सत्य नव्हे. हा सत्याच्या दिशांचा शोध होय, असे खात्रीने सांगता येते.

चूल आणि भाषा यातील भाषिक नजाकत किंवा बोलीची आशयघनता असलेले शब्दधन मराठीच्या शब्दसंस्कृतीला मिळालेले वरदानच! खेडी आज पुष्कळशी बदललेली असली तरी *अन्न हे पूर्णब्रह्म* हे वचन अंगीकारत उदरभरणाचे खेड्याचे प्रधानस्थळ *चूल* तर आजही आहेच. हा चुलीचा परिसर भाषिक ऐश्वर्याचा एक असाधारण दाखलाच. चूल म्हटले की, महिला, श्रम, सैपाक, साधने, नावे आणि भाषा असा एक एकोपा कालानुकाल असलेला.

आज यात परिवर्तन जाणवत असले तरीही *घरोघरी मातीच्या चुली* आणि या अशा चुलीभोवती असलेले भाषिक ऐश्वर्य आमच्या मराठीची अभिजात शानच अधोरेखित करणारे आहे.

या गावसंस्कृतीचे उदरभरण करणा-या या चुलीभोवती मराठी बोलीतील शब्दधन काठोकाठ भरलेले आढळून येते. ही मराठी भाषिक वैभवाची समृद्ध अशी बाब म्हणायला हवी. खेड्यातील चुलीचा हा अवाढव्य आणि महत्त्वाचा परिसर चुलीशी जूडून असलेले भाषिक वैभवच दाखविणारा आहे. ग्राम, प्रदेश, संस्कृती, बोली, शब्द-धन, श्रम आणि महिला यांच्या एकसामायिक संघटनामधून आलेले हे भाषिक वैभव फारच मोलाचे आणि भाषिक उपकृततेच्या दृष्टीने उल्लेखनीय आहे.

चूल परिसरातील बोलीभाषेचे वैभव सोदाहरण पाहूया. कंसात त्या त्या शब्दांचा साररूप अर्थ दिला आहे. जसे की, *सनकाडी* (चूल पेटविण्यास लागणारी शीघ्र ज्वलनशील अशी वाळलेली अंबाडीची काडी), *हुडवा* (शेणाच्या वाळलेल्या गोव-या सांभाळून ठेवण्यासाठी हवाबंद केलेला ढीग, साठवण), *ढेपसा* (विझून शांत झालेली गोवरीची राख, जी खेड्यात आजही अनेकदा दात निर्मळ करावयास दंतमंजनासारखी वापरली जाते), *वतोल* (अंघोळीसाठी पाणी गरम करण्यासाठी न्हाणीघरात असलेला भलामोठा चुल्हा, जणू चुलीचा थोरला भाऊच), *आहार* (चुलीतला धगधगता लालबुंद निखारा), *इसान* (खूप गरम पाण्यात थंड पाणी मिसळून अंघोळीस अनुरूप करावयाची पाण्याची स्थिती), *जळतन* (वाळलेला लाकूडफाटा, केरकचरा जो चूल पेटविण्यास हवा असतो तो) चूल प्रज्वलीत करण्यासाठी ही सगळी साधनसामुग्री आणि त्याभोवती असलेले हे असे मोलाचे भाषिक-धन मराठीत सलग एकाठायी आलेले आढळत नाही.

गाव-चुलीवर केवळ सैपाक होत नाही, तर तिथे साधनभाषा आणि अनोखी शब्दसंपदाही नांदत असते. आता हे पहा, *काठोट* (भाकरीचे पीठ मळण्यासाठी दोन कान असलेली लाकडाची मोठी परात किंवा पराता), *बेलने* (गव्हाची पोळी लाटण्यासाठी दोन हातांनी पोळी करावयाचा रूळ), *बुडगे* (पितळी लहान पेला), *येळनी* (खापराची मोठी वाटी किंवा वाटा), ही गावचुलीची भाषा. तव्यावरची भाकरी परतवण्यासाठी ही भाषा उलथण्याला *सराटा* म्हणते. पाणी ठेवण्याच्या खापरी भांड्यांना ही गाव-माणसं *माथन, केळी, बिनगी* अशा अनेक नावांनी या भांड्यांची ओळख करून देतात.

गावी किंवा वावरात जाताना भाकर-चटणी ठेवायला येथे टिफीन नसतो. तिथे असतो *पालव* (कापडाचा जुना तुकडा) बाजारात जाताना सॅक, पिशवी कुठली? इथे तो असतो *झो-या* किंवा *खलत्या. * गावी, गरीबाघरी संसारात धातूची भांडी ती कुठली! मातीचा, खापराचा, गरीबीची संसार हीदेखील गावाची भाषिक, सामाजिक अभिजात अशीच ओळख पूर्वापारची. इथला सगळा संसार गाडगी-मडकी यांचाच. जिन्नस ठेवायला इथे असते *उतरंड. * म्हणजे खापरी भांड्यांच्या आतल्या घरातल्या रांगा किंवा चळती. या मडक्यांनाही येथील भाषेत अनेक नवी नावे असतात. *गाडगं, मडकं, खापरी, सुगडे, डेरा* इत्यादी. सारांश काय तर स्थळ, घटना, प्रसंग बदलला की, या खापराच्या वस्तू नवा शब्दांचा पेहराव करून वावरतात हे खास वैशिष्ट्य! चुलीचाच हा भवताल, भाषेचा नवा आयाम दाखविणारा!

शिवाय, चुली म्हटले की, जिभेच्या चवीचा चवदार तृप्तीचाही नजराणाच. या चुलीवर रटरटणाऱ्या किती तरी पदार्थांना एक हटके चव आहे आणि भाषेचीही त्यांना अवीट गोडी आहे. उदा. पुरणाची पोळी बुडवून खाण्यासाठी एक पातळ गोडसर पदार्थ बनवतात ते असते *आळण. * सगळी धान्य एकत्रित करून अशा पिठांच्या बनवलेल्या पौष्टिक भाकरीला म्हणायचे *बेलडीची भाकर. * हीच भाकर खान्देशात *कयन्याची भाकर* असते. हिरव्या हरभऱ्याची कोवळी पाने कुटून त्यात चटणीमीठ घालून जो तयार होतो तो असतो *घोळाणा. * जगातल्या कुठल्याही सॅलडला पराभूत करेल एवढा अस्सल हा पदार्थ. घोळाणाचे भाषांतरही अशक्य असा चवदार हा पदार्थ. नाव, भाषा, शब्दही लज्जतदार!

गावभाषेतील चूलपरंपरेत वसून असलेल्या शब्दांना त्यांचा स्वतःचा नाद आहे आणि भाषा म्हणूनही खास अशी खुमारीही आहे. *वळवट, सरगुंडे, बोटवे* हे येथील महिलांनी अपार कष्ट करून बनवलेले भातांचे प्रकार आहेत. नूडल्सची ही आदिम रूपे आहेत. पण नूडल्सला मागे टाकणारी. गव्हाचा मूळ स्रोत वापरून *वळवट, बोटवे* केले जातात. साखर, दूध, तूप घालून खाल्ला जाणारे हे मुलायम स्निग्ध पदार्थ मूलतः सणासुदीला खाण्यात येतात. अळूची पाने इथे *चमकुरा* होऊन आलेली असतात. फळभाज्या उन्हात वाळवून ठेवतात. त्यांना *उस-या* म्हटले जाते. तसेच गूळ आणि पीठ घालून जेवणात गोड बनवलेला पातळसा पदार्थ खेडूतांच्या ताटात येतो तो *लाभडे* होऊन. हे धन जतन करायला हवे.

चूल ही आहार आणि आरोग्याचीही अन्नपूर्णाच. गावाची भाषा चुलीने अधिक रसदार आणि लयदार ठेवली यात काहीच शंका नाही. अशा एकेका स्थळाचा भाषिक महिमा सांगणारे अन्नपूर्णेचे नवे कोश सचित्र, साधार सिद्ध करण्याची आवश्यकता आहे. हे तगडे परंतु सर्वेक्षणाचे, कष्टाचे काम आहे. हे घडले नाही तर एक मोठा ग्रामस्तरीय शब्दऐवज आपण गमावून बसू. मग आपल्याहाती उरेल ती फक्त रूखरूख! या अशा संपन्न गावरहाटीत रोज ताटात येणाऱ्या भाज्यांची नाम-भाषाही नूतन, वेगळी, रसरशीतच आहे! जसे की, कोथिंबीरऐवजी संबार, बटाटेऐवजी आल्लू, ढेमशाऐवजी दिलपसंद, छोट्या काकड्याऐवजी शैलन्या किंवा शेन्ना, भली मोठी काकडी याऐवजी वाळकं, भेंडी असं म्हणण्याऐवजी बोंडं किंवा भेंडरं म्हणणं. वांग्यांची गावाकडे बैंगनं झालेली असतात.

ज्या त्या फळ आणि भाज्यांना मातीतल्या सुवासाला धरून नावे देण्याची गावभाषेची ही रीत मराठी बोलीभाषेची चव आणि या बोलीची खचितच श्रीमंती वाढविणारी आहे. मुख्यत्वे ही सारीच्या सारी बोलीप्रवण शब्दसंपदा मातीचा आणि येथील समग्र समाजजीवनाचा भाषिक, सामाजिक, सांस्कृतिक, कालिक आणि महिलांच्या श्रमनिष्ठेचा अमोल ठेवाच! कुठलीची भाषा एकल नसते. एकट्याची नसते. भाषेचे पाझर दूर आणि खोलवर वाहाते राहिलेले असतात आणि ते समाजाच्या चलनवलनातून अखंडित राहिलेले असतात. समाज आटला की भाषा आटते. हे एवढे भाषिक मौलिकत्व जतन करण्याची जबाबदारी गावमाणसांसह जशी गावाची आहे तशी ती आपल्यातल्या प्रत्येकाचीही आहेच!

लेखक : डॉ. केशव स. देशमुख

प्रस्तुती : श्री सुहास रघुनाथ पंडित

सांगली (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – प्रतिमेच्या पलिकडले ☆ # माझं काय चुकलं?… # ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

श्री नंदकुमार पंडित वडेर

? प्रतिमेच्या पलिकडले ?

☆ # माझं काय चुकलं?… # ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर 

तुम्हाला काही म्हणजे काहीच कसं कळत नाही… ही माझ्या सौ. ची तक्रार आमच्या दहा वर्षां पूर्वी झालेल्या लग्नाच्या अक्षता पडून काही मिनिटं उलटून गेली नाही तेव्हापासून जी सुरू झालीय ती अथक आणि अथक, बिनतोड सुरू आहे राव! … आता तुम्हाला काय सांगायचं! आणि किती किती म्हणून सांगायचं? … सांगायचं झालं तर माझ्या बालपणापासून म्हणजे आमच्या लग्नाच्या आधीही हिच परिस्थिती अशीच होती बरं! .. तेव्हा बायको नव्हती पण ओपनिंग सेरेमनी आई, ताई, मावशी, आत्या आणि आज्जी या समस्त महिला मंडळानी माझं (एकुलता एक असल्यानं) पालन पोषण करताना आपला राईट टू बोलायचा संविधानिक तहहयातीचा हक्क गाजवत होत्याच… त्यांना सगळ्यांना सगळ्यातलं सगळचं काही कळंत होतं (अशी त्यांची त्यांनीच स्वताची करून घेतलेली समज) आणि मला कशातलही ओ का ठो न कळणारा मंदमती… आणि त्यातून जर का मला चुकून माकून काही समजलेच्या आविर्भावात बोलू लागलो, वागू लागलो तर त्यांच्या समजुतीच्या अभेद्य किल्ल्याला भगदाड पडणार नाही याची काळजी घेत.. पुरे पुरे समजली तुझी अक्कल… हे बाकी बरं तुला जमतयं पण हिच हुशारी जरा शाळेच्या अभ्यासात तरी दाखव… झालचं तर कल्याण होईल हो तुझं आणि त्यायोगानं आमचंही… कसा तुझा जन्म निभावणार आहे हे त्या परमेश्वरालाच ठाऊक रे बाबा.. आमच्या पोटी असला माठ जन्माला घालून त्यांनं आमच्या मागे हा काळजीचा भुंगा लावून देऊन तो बसलाय वरती निवांत… हा रोजचा फोडणीचा भात आमच्या घरात कायमच कढईत परतला जात असायचा… माझ्या वाढत्या वयाबरोबर बुध्दीने असमझतो जरी केलेला असला तरी चारचौघांसारखाच शिक्षण पूर्ण करून कारकुनाची का असेना पण पोट भरणारी नोकरीही मिळाली होती.. म्हणजे घरच्या लोकाच्या चिंतेचा भार हलका केला होता कि नाही.. घरची जबाबदारी सांभाळायची माझी तयारी होती पण ते घरातील लोकांनी मला,.. आलाय मोठा घर चालविणारा.. नुसता पैसा मिळवला म्हणजे घर चालवियाची सगळी अक्कल आली असं नसतं. त्यासाठी घरात पुरूष माणसाचं चौफेर व्यवधान असावं लागतं हो.. आणि त्याबाबीत तुझा उजेड आहे हो… असं उपरोधिक बोलून माझा तेजोभंग करत.. मग मी कसल्याच भानगडीत न पडता आपलं खुशाल चेंडू सारखं जगायचं ठरवलं आणि तसाच वागू लागलो… पण या ही माझ्या सुखाला घरच्यांची दृष्ट लागली… अरे हा आता या वयात खुशाल चेंडू बनून राहिला आणी कुठे वाहत गेला तर वाया जाईल.. तेव्हा आताच त्याच्या नाकात संसाराची वेसण घातली तर बरे होईल… निदान बायकोच्या मदतीने त्याची गाडी रुळावर येईल आणि घरादाराकडे नीट लक्ष देईल.. काही अंशी आपल्या डोक्याचा भुंगा तरी कमी होईल… आणि बाकीचा आहे तो भुंग्याचा ताप सहन करायला त्याची बायको बघून घेईल कि सारं… मग काय माझा काही होकार नकार, माझी पसंती ना पसंतीला हेतूपुरस्सर डावलून घराण्याला शोभेल अशा मुलीशी माझा लग्नाचा बार उडवून दिला… आणि आमच्या घरच्या फुटबॉल मैदानात मला वारंवार गोलाकडे लाथा घालत नेण्यासाठी एका नव्या ताज्या दमाच्या खेळाडूची म्हणजे. माझ्या बायकोची नंतर भर पडली आणि या ‘परवलीच्या’ स्लोगनला दुधारी पात्याची धार चढली… म्होरक्या बदलला पण बळी मात्र या माऱ्याने खोल खोल पाताळात जात राहिला… वंशाचा दिवा म्हणून घरातल्या सगळ्यांनी आपापल्या अपेक्षांच्या ज्योती माझ्या कंदीलात प्रकाशित करून घेण्यासाठी त्यांच्या त्यांच्या डोळ्यांची भ्रुकुटीनां ताणून धरल्या… पण माझ्या कतृत्वाचा उजेड मात्र घरदारं काही उजळू शकला नाही… तेव्हा या साऱ्यांनी छे तुझ्यात काहीच दम नाही… अगदीच फुसकाबार निघालास तू… अशी अपेक्षाभंगाची वात चुरचुरत राहीली… मला झेपतयं, पचनी पडतयं तेच आणि तेव्हढचं करत गेलो. मला माझ्या कुवतीची आणि मर्यादांची चांगलीच जाणीव होती… जीवाची उरस्फोड करायला तितका जीवात जीव सुध्दा दमदार असावा लागतोना… तुम्हीच सांगा यात माझं काय चुकलं बरं… सर्व सामान्य माणसाची जी मुलभूत जन्मजात वैशिष्ट्य असतात त्यांनी मी परीपूर्ण होतो… सामान्य बुद्धीचा वकुब, बेतासबात शिक्षणातला उजेड, कारकुनी नोकरीची रिटायर्ड होईपर्यंत टिकवून ठेवण्याची गरूडझेप… वाढलेल्या महागाई भत्ताच्या चार रुपड्यातली पार्टीची चैन… चाळीतल्या दोन खोल्यात थाटलेला आरस्पानी संसार.. मनात गगनभरारीचे स्वप्नांचे पंख लावूनही घराचा उंबरठा ओलांडताना होणारी पडझड… घरात तसे बाहेरही प्रत्येकाला आपलं अपयशाचं, अपशकुनाचा खापर फोडायला माझ्या शिवाय दुसरा मिळणार तरी होता कोण… त्यांची प्रगती होत जावी याच सदच्छिने माझ्या मनाला घातलेली मुरड… आणि त्यांच्यासाठी माझा मीच झालेला स्टेपिंग स्टोन… मग मग मी रूतून बसलो तर यात सांगा माझं काय चुकलं… कधीतरी मनात धडाडीच्या इंगळ्या डसत माझ्या मेंगळटपणाला.. मी अश्या वेळी पेटून उठतो.. आणि मोठ्याने घोषणा करतो बस्स झालं दुसऱ्यासाठी जगणं आणि आता आजपासून जगायचं ते फक्त स्वतःसाठी.. मनमौजी सारखं… कुणाच्याही बंधनात नसलेलं… ती घोषणा फक्त माझी मला सुध्दा ऐकू येत नाही. असल्या कोलाहलात.. माझ्या अवतीभवती असलेले माझेच पाय मागे मागे खेचत राहतात हि जबाबदारी कुणाची.. कर्तव्याची आडकाठी मलाच आडवी घालतात.. नि माझा उत्साहाचा महामेरू पुन्हा एकदा शेळपटून गपगुमान मानेवर जोखड टाकून चालत राहतो… तरी बरं हो जुनी खोडं एकेक करत काळाच्या पडद्याआड जात गेली… एखादं दुसरं चिवट खोडं अजूनही तग धरून आहे आणि मुलूख तोफेचा आकार दिलेल्या माझ्या बायकोच्या बरोबरीने माझ्या अकर्तृत्वाच्या, अपयशाच्या राई राई एव्हढ्या चिंधड्या उडवत राहिल्या… यात माझं प्रौढपणानं आलेलं शहाणपण कुणीच लक्षात घेतलं नाही.. पण घरच्या सगळ्यांनी माझ्या बायकोला माझ्याबाबतीतल्या सगळ्या गोष्टी, सवयी, धमक, इ. इ गोष्टीवर त्यांनी हयातभर प्रशिक्षण देऊन तरबेज केले… आणि मग काय विचारता आधीच मर्कट त्यात मद्य प्राशन केला.. सारखी स्थिती माझ्या बायकोची झाली आणि जेव्हा तिच्याकडे एक हाती सबंध घराची सत्ता एकवटली तेव्हा तर माझा हरघडी उठसूठ प्रत्येक वेळी तुम्हाला काही म्हणजे काहीच कसं कळत नाही… असा उद्दार करण्याचा परवानाच तिला मिळाला… आणि माझी अवस्था त्या शंकराच्या देवळा समोर बसलेल्या नंदी सारखी निश्चल बैठकी सारखी बनली… आलीया भोगासी या शिवाय दुसरं काय म्हणणारं हो… तर अशी बरीच मोठी माझी कहाणी आहे.. त्यातील हा एका भागाचा अल्प अंश तुम्हाला सांगितला… अजून तसंच सगळं रीतीभाती प्रमाणं चालूच आहे… कुणाचं काही अडलेलं नाही फक्त माझं सोडून… तरीपण खेटरं खाणं माझं अजूनही सुटलेलं नाही.. मग आता तुम्हीच सांगा खरंच माझं यात काय चुकलं.?

©  श्री नंदकुमार इंदिरा पंडित वडेर

विश्रामबाग, सांगली

मोबाईल-99209 78470 ईमेल –nandkumarpwader@gmail.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ मला समजलेली संत तुकारामांची गाथा… भाग – ५… ☆ सुश्री अरुणा मुल्हेरकर ☆

सुश्री अरुणा मुल्हेरकर

? विविधा ?

☆ मला समजलेली संत तुकारामांची गाथा… भाग – ५ ☆ सुश्री अरुणा मुल्हेरकर ☆

तुकाराम महाराजांची अधिकार वाणी

विठ्ठल भक्तीत तल्लीन झालेले संत तुकाराम पांडुरंगाशी अधिकार वाणीने संवाद साधतात.

तुकाराम महाराज पांडुरंगाला विठु माऊली असे संबोधतात. बाळाने आईकडे जसा हट्ट करावा, त्याप्रमाणे ते माऊलीला सांगतात,

भक्ती प्रतिपाळे। दीन वो वत्सले।

विठ्ठल कृपाळे ।होसी माये ।।

पडिला विसर ।माझा काय गुणे।

कपाळ हे उणे ।काय करू।।

तुका म्हणे माझे ।जाळूनी संचित।

करी वो उचित। भेट देई।।

विठ्ठला, तू भक्तांचा सांभाळ करणारी आणि दीनांचे रक्षण करणारी अशी कृपाळू माऊली आहेस, मग तुला माझा विसर कसा पडला?

असा जाब ते विचारतात. माझे सर्व संचित तू जाळून टाक, आणि मला भेट देणं हेच तुझं उचित कर्म आहे हे लक्षात ठेव.

त्यांचे दैनंदिन व्यवहारात थोडेही लक्ष लागत नाही. म्हणून ते विठू माऊलीला साद घालतात आणि सांगतात,

पढीये ते आम्ही ।तुजपाशी मागावे।

जीवीचे सांगावे।हितगुज।।

पाळशील लळे ।दीन वो वत्सले ।

विठ्ठले कृपाळे। जननीये।।

जीव भाव तुझ्या। ठेवीयेला पायी।

तुचि सर्वांठायी ।एक आम्हा।।

सर्व सत्ता एकी। आहे तुजपाशी।

ठावे आहे देसी। मागेन ते।।

म्हणवूनी पुढे। मांडीयेली आळी।

थिंकोनिया चोळी। डोळे तुका।।

विठ्ठलाशी संवाद करताना तुकाराम बुवा वरील अभंगात काय म्हणतात बघा. ” देवा, आम्हाला जे आवडते ते आम्ही तुझ्याजवळ हक्काने मागू. आमच्या जीवनातील गुप्त गोष्टी आम्ही तुला सांगू. कारण तू दीनदयाळ आहेस. तूच आमचा आसरा आहेस. तुझ्या हातात सर्व सत्ता आहे, आणि मी जे काही मागेन ते तू मला देशील याची पुरेपूर खात्री आहे. म्हणूनच डोळे चोळीत तुझ्यापुढे मी रडतो आहे. “

तुकारामांच्या मनाची अवस्था अत्यंत अधीर झाल्यामुळे ते देवाला पुढे म्हणतात,

काहो देवा काही। न बोलायची गोष्टी।

का मज हिंपुटी ।करीतसा।।

देवा तुम्ही माझ्याशी असा अबोला धरून मला का बरं निराश करता?

कंठी प्राण पाहे। वचनाची वास।

तो दिसे उदास ।धरीले ऐसे।।

माझे प्राण कंठाशी आले आहेत, आणि तू माझ्याशी कधी बोलशील याची वाट पाहतो आहे. परंतु मला वाटते की मी तुमचा आहे असे म्हणण्यास तुम्हाला लाज वाटते. कारण तुम्ही मला जराही विचारत नाही.

तुकाराम महाराज देवाला सांगतात, ” माझ्या आधी जे संत ज्या ठिकाणी जाऊन पोहोचले आहेत, तेथे तुम्ही मला घेऊन चला. ज्येष्ठ संतांना जो लाभ मिळाला तो मला का मिळू नये? स्वबळाने मला ते मिळवता येत नाही, तुम्हीच मला मिळवून द्या. ” परमेश्वरावर महाराजांचा किती हा अधिकार?

पुढीलांचे इच्छी फळ ।नाही बळ ते अंगी।

संत गेले तया ठाया। देवराया पाववी।।

ज्येष्ठांची का आम्हा जोडी। परवडी न लभो।

तुका म्हणे करी कोड ।पुरवी लाड आमुचा।।

ते असेही म्हणतात की, देवा तुमच्याजवळ मोक्षाच्या राशी आहेत. मग मला देतानाच का हात आखडता?

कैवल्याच्या तुम्हा घरी। राशी हरी उदंड।

मजसाठी का जी वाणी। नव्हे धणी विभागा।।

देवाशी अद्वैत साधताना संसारी तुकारामाला अनंत अडचणी येत होत्या. पांडुरंग आपल्याला भेटत नाही, म्हणून अस्वस्थ मनाने ते पांडुरंगाशी अधिकाराने कसे भांडत होते हे पुढील काही अभंगांवरून प्रत्ययास येते.

तुजची पासाव ।झालोसी निर्माण।

असावे ते भिन्न। कासयाने।।

देवा, तुझ्यापासूनच आम्ही उत्पन्न झालो, आता तुम्हाला सोडून वेगळे कसे राहू?

पहावा जी ठायी ।करुनी विचार।

न्यून कोठे फार ।असेचिना।।

तुम्ही आणि मी यात कोठेही कमी नाही हा विचार तुम्ही आपल्या मनाशी करून पहावा.

ठेवीयेले ठायी। आज्ञेचे पाळण।

करुनी जतन। राहिलेसे।।

तुम्ही मला जसे ठेवले आहे तसे तुमच्या आज्ञेप्रमाणे मी राहतो आहे.

तुका म्हणे आता ।बोलतसे स्पष्ट।

जालो क्रियानष्ट ।तुम्हा ऐसा।।

मी तुम्हाला स्पष्टपणे सांगत आहे की, तुमच्याच प्रमाणे मी क्रिया नष्ट झालो आहे. (माझी देह बुद्धी नष्ट झाली आहे)

सामान्य माणूस प्रपंचात रमून मायाजालात फसला आहे, याचा दोष तुकाराम महाराज त्या देवालाच देतात. हा त्यांचा अभंग पहा.

उगेचि हे मन । राहते निश्चळ।

तरी का तळमळ। साठ होती।

काय तुमची नेणो। कौतुक विंदाने।

सर्वोत्तमपणे। खेळतसा।।

नाना छंदे आम्हा। नाचवावे जीवा।

वाढव्हाव्या हावा । भलत्या पुढे।।

तुका म्हणे तुम्ही। आपुली प्रतिष्ठा।

वाढावया चेष्टा । करीतसा।।

ते काय म्हणतात? हे मन जर आपणहून स्थिर राहिले असते तर एवढी तळमळ आम्ही का केली असती? मला तुमचे कौतुक आणि पराक्रम कळत नाहीत. तुमच्या साऱ्या क्रीडा, तुमचे पराक्रम मोठेपण दाखवतात. पण आमच्या ठिकाणी अनेक प्रकारचे हव्यास उत्पन्न करून तुम्ही आम्हाला संसारात नाचविता. त्यामुळे संसारातील आमची हाव वाढविता. स्वतःची कीर्ती वाढविण्यासाठी या जगातील प्राण्यांची तुम्ही अशी चेष्टा का चालविली आहे?

बापरे! महाराजांनी प्रत्यक्ष परमेश्वरावर असा गंभीर आरोप करण्याचे धैर्य कसे काय दाखवले? याचे उत्तर एकच, ते म्हणजे, संत तुकाराम पूर्णपणे विठ्ठलमय झाले आहेत.

गाथेतील अभंग वाचताना तुकारामांच्या अशा विविध रूपांचे दर्शन आपल्याला घडत जाते.

 क्रमशः… ५ 

© सुश्री अरुणा मुल्हेरकर 

डेट्राॅईट (मिशिगन) यू.एस्.ए.

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ माझ्या आर्मी लाईफची एक झलक… ☆ सुश्री संध्या बेडेकर ☆

सुश्री संध्या बेडेकर

? मनमंजुषेतून ?

☆ माझ्या आर्मी लाईफची एक झलक… ☆ सुश्री संध्या बेडेकर ☆

“हा लेख सेनेच्या सर्व Lady Wives ना समर्पित करते.”  

“Proud To Be A Wife Of an Indian Soldier.” 

आज आम्ही सर्व बहिणी एकत्र जमलो होतो. आमचे स्पेशल गेटटूगेदर होते. ताईच्या घरी नुकतेच renovation झाल्यामुळे घर मस्त दिसत होते. आता त्यांनी वयाच्या व सवयींच्या अनुरूप घरात चेंजेस केले होते. ••••

ताई म्हणाली, •••

अग!! तीस वर्षे झाली. लग्नानंतर काही वर्षांनी आम्ही या घरात रहायला आलो. तेच ते बघून बघून कंटाळा आला होता. मुलांची शिक्षण, लग्न सर्व याच घरात झाली. ••••

मी हसले, •••तर ताई म्हणाली, ••• का ग? कशाला हसलीस?? ••••

मी म्हंटल, ••• अग!! या तीस वर्षांत तर मी अक्षरशः अर्ध्या भारतभर फिरले. या अवधीत किती घर बदलली??? मुलांच्या किती शाळा बदलल्या??? मोजावेच लागेल मला. •••

आता मात्र सर्वांची उत्सुकता वाढली. ••••

‘आर्मी लाईफ ‘ वेगळेच असते. त्याबद्दल जाणून घ्यायची उत्सुकताही असते. काही समज गैरसमज ही असतात. आज सर्वांनी आग्रह केला, म्हणून मी त्यांना माझ्या तीस वर्षांहून जास्त आर्मी लाईफचा अनुभव सांगायला सुरुवात केली. •••••

मी म्हंटल, •••••

लग्नानंतर सामान्यतः एका स्त्री चे आयुष्य म्हणजे तिचा नवरा, त्याची नोकरी, मुले त्यांचे शिक्षण, घर सांभाळणे. प्रामुख्याने हेच तिचे विश्व असते. नवऱ्याच्या नोकरीवर तिचे आयुष्य अवलंबून असते. दोघांनी मिळून घराकडे लक्ष द्यायचे. हा एक साधारण अलिखित करार असतो. ••••

परंतु ‘आर्मी ऑफिसर’ बरोबर लग्न झाल्यावर हे समीकरण थोडं बदलत. कारण 

” An Army man is on duty for 24 hours. “••••

येथे ‘No ‘ शब्द चालतच नाही. It is always ‘YES ‘ and only ‘YES. ‘ •••

नोकरी बरोबर मधून मधून कोर्सेसही असतात. युद्ध व्हाव अस कधीच कोणाला वाटत नाही. पण झालंच तर तुमची तयारी असावी. म्हणून “जीत का मंत्र ” द्यायला,

“लक्ष्य की ओर हमेशा अग्रसर ‘ रहायला ‘physically mentally toughness’ जागृत ठेवायला, वेगवेगळे कोर्सेस होत राहतात. कोणत्याही वेळेस युद्ध जिंकायला तयार असणे. याची तयारी होत असते. ••••

” Actually, Any army personnel is paid for this day only. ” ••••

” आधी देशाचे काम मग घरचे. ” हा साधा सरळ हिशोब असतो. ••••

हे सर्व नोकरीत रुजू व्हायच्या आधी माहीत असतंच. ही नोकरी करणे तुमचा ‘choice’ असतो. तुम्हीच ठरविलेले असते. आर्मी ऑफिसर शी लग्न झाल्यावर का?? कशाला?? मीच का?? असे प्रश्न उद्भवतच नाही. •••••

म्हणून बायकोची जबाबदारी वाढते. ••••

आता थोडं माझ्या बद्दल म्हणजे जनरल ‘army wives ‘ बद्दल सांगायचे झाले तर थोडया फार फरकाने सर्वांची स्टोरी मिळतीजुळतीच असते. ••••••• 

रिटायरमेंट नंतर, सध्या ज्या घरात मी पर्मनंट राहते आहे, ते माझ्या आयुष्यातले ‘वीसावे’ घर आहे. म्हणजे आजपर्यंत मी

वेगवेगळ्या शहरात वेगवेगळया घरात राहिले. कधी दहा खोल्यांचा जून्या ब्रिटिशकालीन बंगल्यात, तर कधी अगदी दोन खोल्यांचे घर.

प्रत्त्येक ‘ posting ‘ मधे अशीच तयारी करायची की, कुठेही सहज राहता येईल. स्वयंपाक करता येईल. म्हणजे प्रत्येक posting मधे ‘mini ‘ संसाराच्या चार पेट्या तयार करायच्या. व वेळ निभावून घ्यायची. ” स्वयंपाक, शाळा, अभ्यास “या तीन गोष्टींना प्राथमिकता द्यायची व नवीन जागी लवकरात लवकर ‘ adjust ‘ व्हायचा प्रयत्न करायचा. आमच्या ‘comfort’ ची व्याख्या खूप सीमीत होती. •••••

प्रत्त्येक ‘ posting ‘मधे दोन तीन पेट्या वाढायच्याच. असं म्हणतात, ••• पेटयांचा टोटल नंबर मोजून आर्मी ऑफिसर ची ‘Rank’ व एकंदर किती’ postings ‘ झाल्या ते कळत. आम्ही रिटायर्ड झालो, तेंव्हा ‘सत्तर’ पेटया होत्या. म्हणजे नोकरीच्या पस्तीस वर्षाचा आमचा संसार त्या जीवाभावाच्या पेट्यांमधे होता. ••••

तुमचे विचार खूप स्पष्ट असले, तर तुम्ही तुमचे आयुष्य छान प्लान करू शकता. आम्हाला या नोकरीचे प्लस मायनस points माहीत होते. म्हणून आम्ही आधीच ठरविले की व्यवस्थित रहायचे. मग पेटयांचा नंबर वाढणारच. त्या टिपिकल काळया लाकडी पेट्या खूप कामाच्या होत्या. त्यांनी आयुष्यभर खूप इमानदारीने आमची साथ दिली. कधी पलंग, तर कधी setty. आवश्यकतेनुसार त्यात सामान ठेवून वेळोवेळी काळया पेटयांची मदत झाली. ••••

आता मुलींच्या शिक्षणाबद्दल सांगायचे झाले तर, माझ्या मुलीने बारावी पास होईपर्यंत बारा शाळांमधून शिक्षण घेतले. म्हणजे साधारण प्रत्त्येक वर्षी •••नवीन शाळा, शिक्षक, मित्र मैत्रीणी बदलायच्या. प्रत्त्येक नवीन जागी स्वतःला प्रूव्ह करायचे. बर, हे सर्व वर्ष सुरू होण्यापुर्वीच होईल असे नाही. एकदा तर ‘ half yearly ‘ परीक्षेच्या एक दिवस आधी अॅडमिशन घेतली. दुसऱ्या दिवशी पासून सुरू होणाऱ्या परीक्षेचे सिलेबस व रोल नंबर घेऊन घरी आलो. ‘उधमपूर ‘ ‘जम्मू काश्मीर’ मधील‌ ही नवीन जागा, ती पण पहाडी, शाळेत admission साठी जाताना एक मुलगी रडली व येताना दुसरी. व त्यात आणखी भर‌, म्हणजे त्यांचे बाबा आमच्या बरोबर नवीन जागी नव्हते. वेळेवर काही कारणाने त्यांना थांबावे लागले. मी मुलींना घेऊन उधमपूर ला पोचले होते. मला तो दिवस चांगला आठवतो. त्यादिवशी दोघींनी दहा बारा तास अभ्यास करून दुसऱ्या दिवशी च्या परीक्षेची तयारी केली होती. कारण सिलेबस वेगळा होता. •••

आर्मी मध्ये नेहमी नवऱ्या बरोबर राहता येईलच, असे नसते, Field posting’ मधे फॅमिलीला बरोबर राहता येत नाही. म्हणून अशा तडजोडी करण्याशिवाय दुसरा पर्याय नसतोच. यात एकच खंत वाटते की अगदी लहानपणापासूनचे बरोबर शिकलेले मित्र मैत्रीणी माझ्या मुलींना नाहीत. •••

यातही एक सकारात्मक विचार असा की •••• प्रत्येक नवीन स्टेशन वर, नवीन मुलांमध्ये, पहिल्या ‘पाच ‘ मधे तुम्ही आपली पोझिशन मेन्टेन ठेवली, तर‌ आयुष्यात पूढे द्याव्या लागणाऱ्या ‘competitive ‘ परीक्षेची तयारी आपोआपच होत जाते. मुलेही टफ लाईफला सामोरे जायला हळूहळू शिकतात. हे सर्व खूप सोप्प नक्कीच नव्हतं, पण दुसरा पर्याय ही नव्हता. बरे असो, याचा प्रभावी परिणाम आता दिसतोय. सर्वांना कुठेही सहज adjust होता येत. ••••

आर्मी म्हणजे एक ‘स्टाइल ‘आहे. एक ‘standard ‘आहे. ‘Status ‘ आहे. बायकांचा ‘ड्रेसिंग सेन्स’ छान असतो. खूप काही नसतानाही ‘limited budget ‘ मधे‌ व्यवस्थित राहणे जमते त्यांना. ‘clean and organised home ‘ ही विशेषता असते त्यांची. Quality of life is v good. वेळेचे महत्व, attiquett manners, junior-senior respect एक protocol असतो. तो पाळायचाच असतो. अनुशासन कडक असते. ••••

lunch \ dinner party चे एक ‘स्टेटस’ असते. एक ‘पद्धत’ असते. तेथे मराठी पणा बाजूला ठेवूनच वागावे लागते. बायकांना खूप मान असतो. म्हणजे अगदी ज्युनिअर आॅफिसरच्या बायकोच्या वेलकम साठी सिनीयर मोस्ट आॅफिसर सुद्धा उभा राहतो. आर्मीत कोणत्याही ‘official ‘ फंक्शन ला seniority व rank च्या हिशोबाने यायची वेळ दिली जाते. ••••

आर्मी म्हणजे एक असे ‘organization’ आहे, जेथे तुमचा ‘personality development program ‘ सतत सहज सुरूच असतो. नवीन जागा, नवीन माणसे, पण त्या त्या शहराचे कल्चर तुम्हाला अनुभवायला मिळते. वेगवेगळे प्रसंग बघून तुमचे व्यक्तिमत्त्व खुलते, बहरते. विचारांची रेंज वाढते. Priorities बदलतात. बायकांना बऱ्याच activities मधे भाग घ्यावा लागतो.

Ladies club, AWWA म्हणजे ‘Army Wives Welfare Association ‘जेथे आम्ही Unit च्या सर्व बायका एकत्र जमतो. काही तरी नवीन शिकतो, शिकवतो. •••

म्हणतात ना, ••••

” जिंदगी खट्टी मीठी होनी चाहिए ।”•••

आर्मीवाल्यांना फक्त खट्टा मीठा च नाही तर, सर्व प्रकारचे अनेक स्वाद सहज चाखायला मिळतात… आजही किती तरी प्रसंग मनावर कोरले गेले आहेत. ••••

ताई म्हणाली, •••सगळयात कठीण posting / वेळ कोणती होती ग??? ••••

मी म्हंटल, ••• अग!!! अंदमान, नागालँड सिक्कीम या थोड्या वेगळ्या postings होत्या. अंदमान ला शाळा फक्त नावालाच होती. •••••

मी जो कठीण काळ बघीतला, तो म्हणजे ‘कारगिल युद्ध ‘. त्यात यांचा सहभाग होता. ते चार महिने हे नक्की कुठे आहेत?? हेही माहीत नसायचे. सर्व पत्रांची ‘ scrutiny ‘ व्हायची. तेंव्हा मोबाईल वगैरे वापरायची परवानगी नसतेच. प्रत्त्येक आठवड्यात एक ऑफिसर पंचवीस किलोमीटर दूर जाऊन आपल्या घरी फोन करून सर्वांची खुशाली कळवत असे. TV वरील रोजच्या बातम्या ऐकून जीव खालीवर व्हायचा. यावेळेस आपली जबाबदारी जास्त आहे, हेही समजत होतच. मुलींकडे लक्ष देणे, त्यांना सांभाळणे हे महत्त्वाचे काम होते. मुलींनी मात्र खूप साथ दिली. विचलित न होता धैर्याने प्रत्त्येक जण आपले काम करत होता. या परिस्थितित माझी responsibility फक्त माझे घरच नाही तर, ‘Unit ‘ च्या इतर families ला सांभाळणे ही पण होती. Unit च्या बायकांना मानसिक आधार देणे. त्यांचे छोटे मोठे प्रश्न सोडविणे, मुलांच्या आजारपणात त्यांची मदत करणे. ही पण जबाबदारी होतीच. ••••.

मी कधी युनिफॉर्म घातला नाही. हातात बंदूक घेतली नाही. परंतु मी silently गोळ्यांचा आवाज ऐकला आहे. मी आर्मी लाइफ जगले आहे, अनुभवली आहे. या नोकरीने आयुष्यात सर्व रंग दाखविले. चांगले -वाईट अनुभव, उतार चढाव बघितल्याने आता कोणत्याही परिस्थितीत आम्ही ‘मजेतच’ असतो. कोणत्याही परिस्थितीला सामोरे जायची हिम्मत ठेवतो. ••••

We do not grow, when things are easy.

We grow when we face challenges.

Life is not a bad story, sometimes you read a bad chater. That’s it.

आजही युनिफॉर्म घातलेला कोणी दिसला की आनंद होतो. सख्खा नातेवाईक भेटल्या सारखे वाटते. आमचे ‘ते ‘ दिवस पुन्हा एकदा नजरेसमोरून जातात. उर्जा वाढते. ••••

‘Challenges ‘ प्रत्त्येकच नोकरीत असतात. काम कोणतेही सोपे नसतेच. प्रत्त्येक जण आपापल्या परीने सेवा /मदत करतोच. तरीही आर्मीत नोकरी करायची आवड / aptitude असावा लागतो. उगीच ओढून ताणून ही नोकरी करता येत नाही. ••••

ही नोकरी म्हणजे, •••

” It’s different. “•••

‘uniform ‘ची एक ‘grace’ असते ‘वजन’ असतं. घालणाऱ्या च्या चेहऱ्यावर जबाबदारी पेलायचा ‘आत्मविश्वास ‘असतो. •••

“मैं हुं ना ” चे आश्वासन चेहऱ्यावर दिसते.

अनेक वर्षापुर्वी चां तो दिवस मला आजही आठवतोय, जेंव्हा आम्ही भेटलो होतो तेंव्हा, ••••••

“I asked him, ••• how much do you earn??

He said, ••• roughly hundred salutes a day. And we got married. ” “•••••

मला लग्नात मिळालेला सर्वात मुल्यवान दागिना म्हणजे तो ‘green uniform ‘व त्यावर त्यावेळी लागलेले ते तीन *STARS* *** होते. त्यांची किंमत आखणारे किंवा ‘purity ‘ चेक करणारे मशीन कोणत्याही सोनाराजवळ नाही. ••••

वयानुसार केस पांढरे होत गेले व खांद्यावरील * STARS * वाढत गेले. जेवढ नशीबात होत तेवढं मिळाल. पैशापेक्षा अनुभवाने श्रीमंत झालो आम्ही. एकाच जन्मात किती तरी बघायला मिळालं. अगदी रिटायर्ड व्हायच्या थोडे दिवस आधी ‘लेह लडाख ‘ मधे झालेल्या ‘ढग फूटी’ च्या वेळेस मेडीकल कव्हर द्यायला हे गेले होते. ••••

‘फूल नाही पण फूलाची पाकळी ‘एवढे आपले योगदान देऊन आम्ही ‘समाधानाने’ व ‘अभिमानाने ‘ रिटायर्ड झालो. •••

या जन्मात आर्मी ऑफिसर च्या ‘बायकोची’ भूमिका होती. पूढच्या जन्मात ही हीच भूमिका करायला मला नक्की आवडेल. •••

आज मन किती तरी जागी फिरून आले. खूपदा डोळे भरून आले. •••

माझ्या बहिणींच्या चेहऱ्यावरील मिश्रित भाव मी वाचू शकत होते.. ••••

” Proud To Be a Wife of an Indian Soldier. “••••

•••• ‘जय हिंद’ ••••

© सुश्री संध्या बेडेकर 

वारजे, पुणे.  

7507340231

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ।। श्री नारद उवाच ।। – नारद भक्ति सूत्रे —सूत्र ३९ आणि ४० ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ☆

श्री संदीप रामचंद्र सुंकले

? इंद्रधनुष्य ?

।। श्री नारद उवाच ।। – नारद भक्ति सूत्रे — सूत्र ३९ आणि ४० ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले 

।। श्री नारद उवाच ।। 

भक्तिसूत्र ३९ – – 

महत्संगस्तुदुर्लभोऽगम्योऽमोघश्‍च ॥ ३९ ॥

अर्थ : संत महापुरुषांची संगत दुर्लभ, अगम्य व अमोघ – (कधीही व्यर्थ न जाणारी) आहे.

विवरण :  मागील सूत्रात महात्म्याची कृपा हे भक्तीप्राप्तीचे अंतरंग साधन आहे असे सांगितले पण तो महत्संग दुर्लभ, अगम्य व अमोघ म्हणजे व्यर्थ न जाणारा आहे असे ते म्हणतात. एका सुभाषितकाराने म्हटले आहे, ‘प्रत्येक पर्वतावर माणिक म्हणजे रत्न सापडत नाही. प्रत्येक हत्तीच्या गंडस्थळात मौक्तिक (मोती) नसतो. प्रत्येक वनात उत्तम चंदनवृक्ष असतो असे नाही, त्याप्रमाणे सर्वत्र साधू दिसतात, सापडतात असे नाही. ‘ बहुतेक संसारी जीव अनादि अज्ञानमूलक संस्काराने शुभाशुभ पापपुण्याचे फल भोगीत असतात. त्यातही बहुतेकांची ऐहिक पारत्रिक विषयभोगातच अधिक प्रवृत्ती असते. मनबुद्ध्यादिकाना तेच संस्कार असतात. म्हणून त्यांची धाव विषयापावेतोच जाते, विषयसंपादन हाच पुरुषार्थ होऊन बसतो. अशा बहिर्मुखतेमुळे हृदयस्थ सच्चितानंद भगवंताचे यथार्थ ज्ञानही नसते. म्हणून भक्तीकडे प्रवृत्ती होत नाही. एखादाच सत्त्वसंपन्न विचारी पुरुष पूर्वसुकृताने परमार्थमार्गात प्रविष्ट होत असतो.

मनुष्य हा समाजप्रिय प्राणी आहे. त्यामुळे त्याला दुसर्‍याच्या संगतीमधे रहावे लागणे अनिवार्य आहे. संगत ही परमार्थाला मारकही असू शकते किंवा पोषकही असू शकते. ऐहिकतेकडे, सुखासीनतेकडे मनुष्याची स्वाभाविक प्रवृत्ती असते. दुर्गुण मनुष्य सहज उचलतो. पण सद्गुण मात्र प्रयत्नपूर्वक बाणवावे लागतात. मद्यप्राशन कसे करावे? हे शिकवण्याची शाळा कुठेही नाही, परंतु आज मद्यार्क निर्मिती हा सर्वात जास्त महसूल मिळवून देणारा उद्योग आहे आणि तोही महाराष्ट्रासारख्या सतांच्या भूमीत, हा दैवदुर्विलास नव्हे काय?

श्रीसमर्थ मनोबोधात संगती कशी असावी याचे वर्णन करतात.

जयाचेनि संगे समाधान भंगे । 

अहंता अकस्मात येउनि लागे ॥ 

तये संगतीची जनीं कोण गोडी । 

जिये संगतीने मती राम सोडी ||४५||

ज्या संगतीमुळे मनुष्य रामापासून दूर जातो अशा संगतीची मनुष्याला स्वाभाविक ओढ असते. पण त्यामुळे मनाचे समाधान भंग पावते. मनुष्याचा जन्म होताच त्याची देहबुद्धि जागृत होते. देहबुद्धि नष्ट होणे हे परमार्थ प्राप्तीसाठी अत्यावश्यक असते. एक सुभाषित आहे.

सङ्ग: सर्वात्मना त्याज्य: स चेद्धातुं न शक्यते ।

स सद्भि: सह कर्तव्य: सन्त: सङ्गस्य भेषजम् ॥

सुभाषितकार म्हणतात की मुख्य म्हणजे संगत कुणाचीच करू नये. पण जर करायचीच असेल तर सज्जनांचीच संगत करावी. समाजात राहून पूर्ण नि:संग होणे कुणाही मनुष्यास शक्य नाही. समाजात सज्जन-दुर्जन, चांगली, धूर्त, लबाड, वाईट सर्वच प्रकारची माणसे असतात. या सर्वांची संगत पूर्णपणे टाळणे शक्य नाही, तरीही कोणाच्या संगतीत रहावे व कोणाच्या संगतीत राहू नये य़ाचे स्वातंत्र्य मनुष्याकडे नक्कीच आहे. तेव्हा मनुष्याने विवेकाने नास्तिक, लोभी, दुर्जन यांची संगत टाळावी व संतांचीच संगत धरावी.

संगतीचा विलक्षण परिणाम मनुष्यावर होत असतो. मनुष्याच्या हातात कोणी काठी दिली तर तो काठी कुणाला मारण्याचा प्रयत्न करेल पण काठीऐवजी त्या मनुष्याच्या हातात आपण जपमाळ दिली तर मात्र तो त्या माळेने नामजप करण्याची शक्यता जास्त. काठीच्या संगतीचा परिणाम वेगळा आणि जपमाळेच्या संग लाभला तर मनुष्याच्या वागण्यात किती फरक पडतो आणि जर साक्षात भगवंताचा म्हणजे त्याच्या नामाचा संग लाभला तर त्या मनुष्यात किती फरक पडेल. संतसंगतीमुळे मनुष्याच्या जीवनाचे सार्थक होते.

चोखंदळ वाचकांनी खालील मनाच्या श्लोकांचा अभ्यास अवश्य करावा.

मना गुज रे तूज हे प्राप्त झाले।

परी अंतरी पाहिजे यत्न केले॥

सदा श्रवणे पाविजे निश्चयासी।

धरी सज्जनसंगती धन्य होसी॥२०२॥

*

मना सर्वही संग सोडुनि द्यावा।

अती आदरे सज्जनाचा धरावा॥

जयाचेनि संगे महादुःख भंगे।

जनी साधनेवीण सन्मार्ग लागे॥२०३॥

*

मना संग हा सर्वसंगास तोडी।

मना संग हा मोक्ष तात्काळ जोडी॥

मना संग हा साधका शीघ्र सोडी।

मना संग हा द्वैत निःशेष मोडी॥२०४॥

*

एकनाथी भागवतात कृष्ण आणि उद्धवाचा संवाद आहे, त्यात भगवंत म्हणतात,

“ऐशी तुझी सुलभ भक्ति । तरी अवघेचि भक्ति कां न करिती । 

देवो म्हणे भाग्येंवीण माझी भक्ति । न घडे निश्चितीं उद्धवा ॥ 

कोटि जन्मांची पुण्यसंपत्ती । जरी गांठीं असेल आइती । 

तैं जोडे माझ्या संतांची संगती । सत्संगें भक्ती उल्हासे॥”

(संदर्भ:- एकनाथी भागवत अध्याय ११, १५४९, ५०)

पूर्वसुकृत उदयास आले तरच संतसंग लाभतो. ध्यानीमनी राम असेल तर आपल्या कामात सुध्दा राम दिसतो. श्रीसद्गुरू गोंदवलेकर महाराजांच्या पायाला कान लावला तर त्यातून रामनाम ऐकायला येई असे वर्णन त्यांच्या चरित्रात आढळते.

माऊली म्हणतात की माझे अनंत जन्माचे पुण्य फळा आले म्हणून माझ्या मुखी नाम आले. साधकाने नाम घेताना हा भाव नित्य ध्यानी ठेवला तर नामाची गोडी खात्रीने चाखायला मिळेल असे वाटते.

लौकिक उदाहरण द्यावयाचे तर विजेचा प्रखर दाब जेथे साठविला गेला आहे त्या विद्युत घटाशी दुरून जरी स्पर्श झाला तरी ती वीज सर्वांगात क्षणात प्रविष्ट होते, तसे संत हे ज्ञान, वैराग्य, भक्तिप्रेम यानी कायावाचामनाने संपूर्ण व्यापून गेलेले असतात. तसेच सर्वानी याचा आपल्या जीवनात उपयोग करून घ्यावा व आपले जीवन भगवन्मय बनवावे हीच त्याची धारणा व खटपट असते. याकरिता त्याच्या संगतीत कोणी कसा जरी आला तरी त्याचे गुण दोष याति न विचारिता, सर्व संत त्या व्यक्तीवर कृपा करीत असतात. कोणी कितीही अज्ञानी, दुष्ट, दुराचारी, पापी असला तरी त्याची ती पापशक्ती संतांच्या पापनाशक, तारक अशा करुणाशक्तीपुढे व्यर्थ होते म्हणून महत्संग ‘अमोघ’ आहे असे सूत्रात म्हटले आहे.

भक्तिसूत्र ४० – – 

लभ्यतेऽपि तत्कृपयैव ॥ ४० ॥

अर्थ : केवळ भगवंताच्या कृपेनेच सत्संग लाभतो.

विवेचन :  मागील सूत्रात महात्संग दुर्लभ आहे असे सांगितले आहे. दुर्लभ म्हणजे अशक्य नव्हे, अशक्याचा विचारच करावयाचा नसतो. दुर्लभ म्हणजे सामान्य प्रयत्नाने प्राप्त न होणारा. ज्याकरिता काही विशेष अधिकार, विशेष साधन अपेक्षित असते, तसा महत्संग दुर्लभ म्हणजे अगदीच न प्राप्त होणारा असा म्हणता येत नाही, तर त्याचे जे साधन या सूत्रात सांगितले आहे त्यानेच प्राप्त होणारा तो आहे. ते म्हणजे भगवत्कृपा.

जोपर्यंत भगवंताची कृपा होत नाही तोपर्यंत सद्‌गुरू प्राप्त होत नाही असे एक वचन आहे. भगवंताची कृपा कधी होईल याचा काहीही नेम नाही. ज्याप्रमाणे पाऊस कधी पडेल, याचा अंदाज हवामान खाते सांगू शकेल, पण अमक्या वेळी अमुक ठिकाणी पाऊस पडेलच असे सांगणे शक्य नाही. भगवंताच्या कृपेच्या बाबतीत सुद्धा आपण हेच समजू शकतो. आजपर्यंत अनेक संत होऊन गेले, त्यांनी विविध प्रकारे साधन केले आणि भगवंताची प्राप्ती करून घेतली. पण इथे प्रत्येकाचा मार्ग वेगळा आहे, प्रत्येकाची सामाजिक, आर्थिक आणि बौद्धिक पातळी वेगवेगळी असल्याचे आपल्या लक्षात येईल. पण त्यांची स्थिती अमुक अमुक होती म्हणून त्यांना भगवंताची प्राप्ती झाली असे म्हणणे चुकीचे ठरू शकेल.

यावन्नानुग्रहस्साक्षाज्जायते परमात्मनः।

तावन्न सद्गुरुं कञ्चित्सच्छास्त्रमपि नो लभेत॥

पूज्य बाबा बेलसरे एका ठिकाणी म्हणतात. साधना करून काहीही साधत नाही. मग, साधना का करायची? साधना अशासाठी करायची की साधनाने साधत नाही हे कळण्यासाठी साधना करायची. शेवटी देवाची प्रार्थना करायची की देवा, मला शक्य ते मी सर्व केलेझ तरी तुझी प्राप्ती झाली नाही. आता तूच काहीतरी कर. असे केले तर मनात शरणागत भाव दृढ होऊ लागतो. ज्याक्षणी साधक संपूर्ण शरणागत होऊन देवाची आळवणी करतो, तेव्हा भगवंताला यावेच लागते…! द्रौपदीने काकुळतीला येऊन भगवंतांची प्रार्थना केली, भगवंत धावत आले. गजेंद्राने अशीच प्रार्थना केली, भगवंत त्याला वाचवायला आले.

संत तुकाराम महाराजांचे चरित्र सामान्य प्रापंचिक मनुष्यासाठी आदर्श आहे, असे श्रीगोंदवलेकर महाराज सांगतात. संत तुकारामांच्या गाथेचा अभ्यास करताना असे लक्षात येते की त्यांना साक्षात्कार होण्या आधीचे जे अभंग आहेत, त्यात ते पांडुरंगाला विनवणी करतात की देवा मला सत्संग घडू दे. त्यात ते सत्संगाचा महिमा अधोरेखित करतात.

“तुम्ही संत मायबाप कृपावंत| काय मी पतित कीर्ती वाणू ||१|| अवतार तुम्हां धराया कारण उद्धरावे जन जडजीव ||२|| वाढवाया सुख भक्ति भाव धर्म कुळाचार नाम विठोबाचे ||३|| तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी तैसे तुम्ही जगी संतजन ||४||”

भगवंतांची प्राप्ती झाल्यानंतर एका अभंगात ते म्हणतात,

“आम्ही वैकुंठवासी| आलो याच कारणासी||बोलिले जे ऋषी| साच भावे वर्ताया ||”

या सूत्रात ‘लभ्यते’ हे क्रियापद सहेतुक वापरले आहे. म्हणजे यात ‘लाभ’ होणे हा अर्थ ध्वनित होतो. लाभ हे शब्द अनुकूल व प्रयोजनयुक्त वस्तूच्या प्राप्तीकडेच केला जातो. संत तुकाराम महाराजांचा एक अभंग इथे देणे उचित होईल.

“दुर्बुद्धहि ते मना । कदा नुपजो नारायणा ॥१॥

आतां मज ऐसें करीं । तुझे पाय चित्तीं धरीं ॥२॥ 

उपजला भावो । तुझे कृपे सिद्धी जावो ॥३॥ 

तुका म्हणे आतां । लाभ नाहीं या परता ॥४॥”

– – सत्संगतीपेक्षा दुसरा श्रेष्ठ लाभच नाही, असे संत तुकाराम महाराज आपल्याला सांगतात.

साधकाच्या हातात आपली साधना नियमितपणे करावी आणि आपला शरणागत भाव कसा वाढेल यासाठी प्रयत्न करावेत. भगवंत कृपा केल्याशिवाय रहाणार नाही.

भगवत्कृपा व सत्संग याच्या प्राप्तीचा कार्यकारण संबंध सांगितला तो कसा सिद्ध होणार? याचे उत्तर पुढील सूत्रात दिले आहे.

नारद महाराज की जय!!!

– भक्ती सूत्र क्र. ३९ आणि ४०. 

© श्री संदीप रामचंद्र सुंकले (दास चैतन्य)

थळ, अलिबाग. 

८३८००१९६७६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares