मराठी साहित्य – सूर संगत ☆सूर संगीत राग गायन (भाग ७) – राग~ बागेश्री/बागेसरी ☆ सुश्री अरूणा मुल्हेरकर

सुश्री अरूणा मुल्हेरकर

☆ सूर संगत ☆ सूर संगीत राग गायन (भाग ७) – राग~ बागेश्री/बागेसरी ☆ सुश्री अरूणा मुल्हेरकर ☆ 

चतूर सुजन राग कहत

बागेसरी शास्त्र विहीत

खर हर प्रिय मेल जनित

पंचम अति अल्प गहत…….

समवादी खरज रहत

रात त्रितीय प्रहर रमत

म ध संगत चितको हरत…..

शास्त्रकारांनी केलेले हे बागेश्रीचे वर्णन!

अतिशय मधूर स्वरांची ही रागिणी काफी थाटांतून उत्पन्न झालेली,मध्यम आणि   षड् ज वादी व संवादी सूर असून गंधार,धैवत व निषाद कोमल आहेत. आरोहांत पंचम पूर्णपणे वर्ज्य.मप(ध)मप(ग)इतकाच पंचमाचा उपयोग.

आकाशांत पुनवेचा चंद्रमा उगवला आहे,त्याच्या शीतल प्रकाशाने आसमंत न्हाऊन निघाला आहे आणि तुडूंब भरलेल्या सभागृहांत हरीप्रसाद चौरसियांसारख्या दिग्गज कलाकाराने बासरीतून बागेश्रीचे स्वर काढले आहेत,श्रोते देहभान विसरून

म(ध)(नि)सां,(ध)(नि)सां अशा कोमल  सुरांच्या वर्षावात चिंब भिजताहेत, हा सोहळा कसा वर्णावा? कृष्णाच्या बासरीचे सूर ऐकून विरहाने व्याकूळ झालेल्या राधेची झालेली सैरभैर अवस्था, तिच्या मनांतील शंका कुशंका हेच भाव जणू काही या बागेश्रीतून बोलके झाल्यासारखे वाटतात, आणि “मोहे मनावन आये हो, सगरी रतिया किन सौंतन घर जागे” या पारंपारिक बंदीशीची आठवण येते. जयपूर घराण्याच्या गायकीतून ही विरहावस्था चांगलीच जाणवते.

कुमार गंधर्वांनी याच बागेश्रीच्या सुरांतून वेगळा भावाविष्कार दाखविला. “टेसूल बन फूले रंग छाये, भंवर रस ले फिरत मदभरे”

पळसाचे बन फुलले आहे, भ्रमर फुलांतील मधुसेवनाचा आनंद घेत आहेत, हे सांगणारे निसर्गाचे चित्र त्यांनी ह्या बंदीशीतून रेखाटले.

“फेर आयी मौर मेरे अंबूवापे” ह्या बंदीशीत त्यांनी निसर्गचक्र अविरत फिरतच असते हा भाव दाखविला. याचाच अर्थ असा चैतन्य, समृद्धी ही वातावरण निर्मीति बागेश्रीच्या सुरावटींतून केली.

“जा रे बदरा तू जा” ही प्रभा अत्र्यांची बंदीश मनाला भुरळ पाडणारी आहे. नाजूक भावनांची जपणूक करणार्‍या बागेश्रीच्या सुरांवर हळुवार मींड हा अलंकार  चांगलाच खुलतो.

या रागावर आधारित बरीच नाट्यपदे आणि सुगम भावगीते आपल्या परिचयाची आहेत. सौभद्रातील “बहुत दिन नच भेटलो सुंदरीला” हे बागेश्रीतील  गाजलेले पद! तरूण आहे रात्र अजुनी(सुरेश भटांची गझल) आणि(घनु वाजे घुणघुणा वारा वाहे रुणझुणा) हा ज्ञानेश्वरांचा अभंग र्‍हुदयनाथ मंगेशकरांनी बागेश्रीच्या आधारावरच संगीतबद्ध केला. मृदुल करांनी छेडीत तारा, नाम घेता तुझे गोविंद ह्या भक्तीगीतांवरही बागेश्रीचीच छाया आहे. राधा ना बोले ना बोले, आजा रे परदेसी,घडी घडी मेरा दिल धडके, जा जा रे बालमवा ही हिंदी चित्रपटांतील गाजलेली गाणी या बागेश्री रागावर आधारीतच आहेत.

हमे कोई गम नही था (बेगम अख्तर), एक दीवाने को आये है समझाये कही (जगजीत सिंह), चमनमे रंगे बहार उतरा (गुलाम अली) हे गझल आजही रसिकांचे मन लुभावणारे आहेत.

कलाकारांचे व रसिक गणांचे अतिशय प्रेम असलेला हा राग! वागीश्वरी ह्या मूळ शब्दांतून अपभ्रंशित शब्द बागेसरी व त्यानंतर बागेश्री ! सरस्वतीची मधूर, प्रेमळ, भावूक वाणी!

क्रमशः….

©  सुश्री अरूणा मुल्हेरकर

डेट्राॅईट (मिशिगन) यू.एस्.ए.

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ सांजवेळ … ☆ सौ. उज्ज्वला सुहास सहस्रबुद्धे

सौ. उज्ज्वला सुहास सहस्रबुद्धे

☆  विविधा ☆ सांजवेळ … ☆ सौ. उज्ज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆ 

ही अशी सांजवेळ आली की मन थोडं अस्थिरच होते! सकाळची उभारी माध्यान्हीपर्यंत राहते आणि नंतर तिला कुठून कलाटणी मिळते ते कळत नाही,

मन उतरणीला लागतं! दिवस आणि रात्रीला जोडणारी ही सांजवेळ! जणू काळजाचा तुकडाच असते ती! सूर्योदयापासून आपण आपल्या उद्योगात इतके मग्न असतो की ही सांजवेळ इतकी लवकर डोकावेल याचे भानच नसते.

बालपणीची कोवळीक घेऊन सूर्य उगवतो, त्याआधी आभाळभर पसरलेला असतो तो त्याचा लाल, केशरी गालीचा! त्यावर लडिवाळपणे खेळत असतो तो बाल सूर्य! त्याच्या तप्त किरणांची शस्त्रे त्याने घरीच ठेवलेली असतात जणू!  जसजसे आकाशाचे अंगण त्याला खेळायला मुक्त मिळत जाते तसतसा  तो सर्वांगाने तेजस्वी होतो. त्याचे हे रूप कधी सौंम्य तर कधी दाहक असते. जेव्हा त्याची ही मस्ती कमी होऊ लागते, तेव्हा पुन्हा तो क्षितिजाशी दोस्ती करायला जातो. आपल्या सौम्य झालेल्या बिंबाची दाहकता कमी करत निशेला भेटायला! मधल्या या अदलाबदली च्या काळात ही सांजवेळ येते!

निसर्गाचे हे रूप मनामध्ये स्वप्नवत गुंतून राहते! मिटल्या डोळ्यासमोर अनेक सूर्यास्त उभे राहतात! समुद्रामध्ये बुडत जाणारे लाल केशरी सूर्यबिंब तर कधी डोंगराचा रांगात, झाडाझुडपात हळूहळू उतरणारे सूर्याचे ते लाल-केशरी रूप! आभाळ भर रंगांची उधळण असते म्हणून निसर्गाची ही ओढ मनाला खूपच जाणवते, जेव्हा आपलं मुक्त फिरणं बंद होतं तेव्हा! उगवती आणि मावळती या सूर्याच्या दोन वेळांच्या मध्ये असताना दिवस बाहेरच्या व्यापात कसाही जात असतोच. वेळ काही कोणासाठी थांबत नाही, पण ही सांजवेळ मात्र मनाला स्पर्शून जाते!

आयुष्याच्या उतरणीचा काळ असाच वेगाने जात असतो. जन्मापासूनचे बालरूप बदलत बदलत मनुष्य तरुण होतो, कर्तव्यतत्पर होत जातो. आयुष्याच्या माध्यांनीला तळपत्या सूर्याप्रमाणे तो कार्यरत असतो. जमेल तितक्या जास्त तेजाने तळपत असतो,तेव्हा कळत नाही की नंतर येणारी उतरण ही अधिक तीव्र स्वरूपाची असणार आहे! सध्यातरी मला या उतरणीची खूप जाणीव होते! आयुष्याची चढण कधी संपली कळलंच नाही आणि ह्या उतरणीच्या  सांजवेळे ला मी आता सामोरे जात आहे! कोरोनाच्या काळात एक नवीन धडा शिकलोय घरात बसायचा! जो अगदी संयमाने आपण पाळलाय! आता वाट पहातोय ती नवीन दिवसांची! ही हूरहूर लावणारी सांजवेळ संपून रात्री ची चाहूल लागली आहे.आनंद इतकाच आहे की आता नवीन दिवस उजाडणार आहे!

गेल्या कित्येक महिन्यांपासून आपण जी निराशादायी सांजवेळ अनुभवत होतो, ती संपून नवीन आरोग्यदायी आशेची पहाट उगवू लागली आहे!

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ शाहू महाराजांचे प्राणीप्रेम: गजराज मोतीची शस्त्रक्रिया-2 ☆ संग्राहक – सौ.अस्मिता इनामदार

सौ.अस्मिता इनामदार

☆ इंद्रधनुष्य ☆ शाहू महाराजांचे प्राणीप्रेम: गजराज मोतीची शस्त्रक्रिया-2 ☆ संग्राहक – सौ.अस्मिता इनामदार ☆ 

दुसऱ्या दिवशी महाराज पिराजी मिस्त्रीला घेऊन आले. तेव्हा जखमेची पाहणी करुन पिराजी म्हणाला,”उरलेल्या दाताला जिथून दात्र्या पडल्या आहेत तेथून दात कापून टाकू.” महाराजांनी पिराजीच्या योजनेस संमती दिली. शस्त्रक्रियेसाठी हत्तीला सोनतळी कँपवर हलविण्यात आले. लोखंडही कापू शकतील आशा धारदार करवती पिराजीने आणल्या. मोतीला शांत ठेवण्याचे काम महाराजांनी अंबादास माहूताकडे सोपवले. मोतीचे पाय साखळदंडाने जखडून टाकले. हत्ती ठाणबंद झाला खरा पण सोंड मोकळीच होती. शस्त्रक्रियेसाठी जवळ जाणाऱ्याला तो सोंडेने उचलून फेकून देईल ही भीती होती. सोंड कशात तरी गुंतवून ठेवली पाहिजे यासाठी महाराजांनी एका नवीन साधनाचा शोध लावला. त्याचे तंत्र पिराजीस सांगितले व कुशल पिराजीने ते साधन तयार केले. “गळसाज” असे नाव देऊन ती साखळी हत्तीच्या गळ्यात घातली. लॉकेटप्रमाणे या साखळीत भक्कम काटेरी गोळा अडकविण्यात आला होता. हत्तीने हालचाल केली कि त्या गोळ्याचे अनकुचीदार काटे हत्तीच्या सोंडेला व पायाला टोचत. गोळ्याचे काटे टोचू नयेत म्हणून हत्ती साखळी सोंडेने उचलून धरी. अशाप्रकारे मोतीच्या सोंडेला गोळा उचलून धरण्याचे काम लागले !

अशाप्रकारे मोतीला ठाणबंद करुन पिराजी करवत घेऊन दात कापण्यासाठी मोतीच्या मानेखाली गेला. अंबादास हत्तीला गोंजारुन शांत ठेवू लागला पण पिराजीने दाताला करवत लावताच मोती बिथरला. हा माणूस आपल्याला इजा करणार असे वाटून तो पिराजीस पकडण्याचा प्रयत्न करु लागला. सोंड गुंतली असल्याने तो इकडेतिकडे झुकू लागला. त्यातूनही पिराजीने दाताला करवत लावली पण हत्तीने हिसडा दिल्यामुळे ती तुटली. तो दुसरी करवत लावणार तोच महाराज ओरडले, “पिराजी निघ बाहेर. मोती पायाखाली धरतोय तुला.” पिराजी पटकन हत्तीपासून दूर झाला. यानंतर हत्तीला झुलता येऊ नये म्हणून हत्तीच्या दोन्ही बाजूना बळकट दगडी भिंत बांधण्यात आली आणि पुन्हा एकदा शस्त्रक्रियेस सुरुवात झाली. आता मोतीला हालचाल करता येत नव्हती. पिराजीने दाताला करवत लावली. मोतीला राग आला व सोंडेला टोचणाऱ्या काट्यांची पर्वा न करता मस्तक फिरवू लागला.एकापाठोपाठ एक करवती मोडत होत्या. पिराजी आपल्या कामात मग्न होता. मोतीने दुसरीच युक्ती योजली. तो पुढचे पाय पुढे व मागचे पाय मागे पसरु लागला. त्याचे पोट खाली येत पिराजीला भिडले. पिराजी हत्तीखाली चेंगरणार तोच महाराजांनी पिराजीला ओढून बाहेर काढले.

महाराजांनी डाकवे मेस्त्रींना बोलावून दोन्ही बाजूंस हत्तीच्या पोटाला घासून भिंत बांधून घेतली. परत शस्त्रक्रिया सुरु झाली. मोतीला किंचितही हालता येईना. पाय पसरु लागताच पोट भिंतीला घासू लागले. त्यामुळे पायही पसरता येईनात. पिराजीने करवतीने काही दात्र्या कापल्या. हत्तीलाही कळून चुकले की हि माणसे आपल्याला इजा करणार नाहीत, तर आपल्या वेदना कमी करण्याच्या प्रयत्नात आहेत. तोही समंजसपणे वागू लागला; मुळात मोती होताच समंजस ! हत्तीने सहकार्य करताच आठ दिवसांत पिराजीने खुबीदारपणे दात कापला. कापलेला दात तसाच राहू दिल्यास इन्फेक्शन होऊन हत्तीस इजा होईल म्हणून, एक चांदीचे टोपण तयार केले व दाताला भोके पाडून स्क्रूने आवळून गच्च बसविले. मोती यातनामुक्त झाला. शस्त्रक्रियेचा प्रयोग यशस्वी झाला. हा प्रयोग यशस्वी करणाऱ्या पिराजी मेस्त्री, डाकवे मेस्त्री व अंबादास माहूताला स्वतःच्या पंगतीला बसवून घेऊन महाराजांनी मेजवानी दिली.

मोतीने एक दात गमावला. त्याचबरोबर त्याच्या भोवती असलेले वैभवाचे वलयही विरुन गेले. अंबारीला, छबिना मिरवणुकीला आता तो घेतला जाणार नव्हता. हे शल्य अंबादास माहूताला बेचैन करत होते. मोतीला पूर्वीचे वैभव प्राप्त झाले पाहिजे, ही महाराजांची उत्कट इच्छा होती. मोती होताच तसा विलोभनीय शरीरयष्टीचा व समंजस वृत्तीचा. एकदा महाराज मोतीजवळ उभे असता पिराजीला म्हणाले, “पिराजी, मोतीला दात बसवला पाहिजे. त्याशिवाय त्याला अंबारीसाठी घेता येणार नाही की मिरवणूकीसाठी बाहेर काढता येणार नाही.” तेव्हा पिराजी म्हणाला, ” बसवूया की महाराज. त्यात काय अवघड हाय ! भेंडीच्या लाकडाचा दात करतो. ते वजनाला हलकं, हत्तीच्या दाताच्या रंगाचं आणि महत्त्वाचं म्हणजे त्याला हिर नसतात. त्यामुळे दातासारखा दात करता येईल.” पिराजी कामाला लागला. अगदी तुटलेल्या दातासारखा हूबेहूब दात त्याने केला. त्याला पॉलिश केले. पाहणाऱ्याला तो खरा हस्तीदंत वाटायचा. हा लाकडी दात पिराजीने मोठ्या कौशल्याने चांदीच्या विळीच्या सहाय्याने मूळच्या दातास बेमालूम जोडला. दुसऱ्या दाताभोवतीही चांदीची विळी अडकवली. त्यामुळे पाहणाऱ्यास चांदीची विळी म्हणजे हत्तीचा अलंकार वाटे. दोन दातांचा डौलदार मोती पाहून महाराजांना अपरिमित आनंद झाला. अंबादास आनंदाने नाचू लागला आणि मोडक्या दाताच्या ठिकाणी आलेला दात पाहून मोतीसुद्धा आनंदित झाला. पुढे मोतीचा छबिना मिरवणुकीचा मानही अबाधित राहिला.

संग्राहक – सौ अस्मिता इनामदार

पत्ता – युनिटी हाईटस, फ्लॅट नं १०२, हळदभवन जवळ,  वखारभाग, सांगली – ४१६ ४१६

मोबा. – 9764773842

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “ते” होते म्हणून – भाग-2☆ सुश्री राजलक्ष्मी देशपांडे

सुश्री राजलक्ष्मी देशपांडे

☆ विविधा ☆ “ते” होते म्हणून – भाग-2 ☆ सुश्री राजलक्ष्मी देशपांडे 

दयानंदांनी वेदांचा अधिकार स्त्रियांना, शूद्रांना सर्वांनाच आहे, हे वेदांच्या सहाय्यानं समजावून दिलं.त्यामुळं घडलेली क्रांती मोठी होती.वेदच नव्हेत तर आधुनिक शिक्षणही स्त्रियांना देण्यात ज्यांनी ज्यांनी पुढाकार घेतला, त्यांच्यावर दयानंदांच्या विचारांचा परिणाम होत होता किंवा त्यांना यामुळे अधिकृतपणे धर्माचा पाठिंबा मिळाला.स्त्रीशिक्षण,जातिनिरपेक्षता हे धर्माविरुद्ध आहे असं म्हणणाऱ्या सनातनी लोकांना त्यांच्याच भाषेत उत्तर मिळालं.

आज व्यवसाय म्हणून पौरोहित्याचा मार्ग स्त्रियांना खुला झाला आहे यामागे दयानंदांचं खूप मोठं योगदान आहे.

त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा कधीच प्रसिद्ध न झालेला पैलू म्हणजे भारतात घड्याळाचा कारखाना काढता येईल का,यासाठी त्यांनी विचार व पत्रव्यवहार केला होता.आर्थिकदृष्ट्या देश स्वावलंबी असावा हा यामागचा विचार! अर्थात तो अयशस्वी झाला.

तरी भारत “राष्ट्र”म्हणून उदयाला यावा ही त्यांची धडपड होती.

परकीय आक्रमणाची टांगती तलवार डोक्यावर असणाऱ्या उत्तरेकडच्या प्रांतात विशेषतः पंजाब,हरियाणात आर्य समाज रुजला कारण मूर्तीपूजा,त्याचा थाटमाट,मंदिरांचे ऐश्वर्य यासाठी त्यांच्याकडे स्वस्थता आणि सुरक्षितता नव्हती.त्यामानाने स्वस्थ, सुरक्षित दक्षिणेकडील प्रांतात आर्य समाज रुजला नाही.पण आजही आर्य समाजाचं काम चालू आहे.

दयानंदांवर माउंट अबू इथे विषप्रयोग झाला.त्यांना वैद्यकीय मदत लवकर मिळू नये अशी व्यवस्था करण्यात आली होती.तो कुणी केला, याबद्दल मतभेद आहेत.त्यांच्या कार्यामुळे हिंदू सनातनी, मुस्लिम, ख्रिश्चन धर्मप्रसारक, ब्रिटिश सरकार, काही विलासी संस्थानिक या सर्वांच्याच हिताला बाधा येत होती.पण एक नक्की…..

भारतातील अनेक पुरोगामी,देशहितकारी विचारांवर दयानंदांच्या विचारांची छाया आहे.प्रगतीच्या शिडीतील ही एक विस्मरणात गेलेली महत्त्वाची पायरी आहे,हे विसरता येणार नाही.

© सुश्री राजलक्ष्मी देशपांडे

मो – 7499729209

(लेखात व्यक्त केलेली मते लेखकाची वैयक्तिक मत आहेत.)

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ व्हाट्स ऍप, आजी आणि प्रायव्हसी -सिक्युरिटी ☆ श्री योगेश गोखले 

 ☆ विविधा ☆ व्हाट्स ऍप, आजी आणि प्रायव्हसी -सिक्युरिटी ☆ श्री योगेश गोखले ☆ 

ताई आजी आपल्या नातवाची वाटच पहात होती. गेले २ दिवस परीक्षेमुळे तो बिझी होता. व्हाट्स ऍप बंद पडणार असं ४ दिवसापूर्वी तिला कोणीतरी भजनीमंडळात सांगितलं. तेव्हा तिने लक्ष दिलं नाही. पण गेले २-३ दिवस नवीन टर्म्स आणि कंडिशन्स एकसेप्ट नाही केल्या तर व्हाट्स ऍप बंद होणार असे कमीत कमी १० मेसेजेस तिला वेगवेगळ्या ग्रुप वर आले.  रोज मंदिरात, संध्याकाळी कट्ट्यावर दुसरा विषय नाही गेले दोन दिवस. आणि मग मात्र तिला पटलं की आता व्हाट्स ऍप खरंच बंद होणार. मोबाईल च्या बाबतीत हुकमी एक्का म्हणजे नातू. पंच्याहत्तरीला ५ वर्षांपूर्वी त्यानेच तर बाबांच्या मागे लागून तिला स्मार्ट फोन घेवून दिला होता. संसार, माहेर, नातवंड यांच्या ग्रुप वर तिला एड करून दिलं. “स्नेहमंडळ” नावानी तिच्या मैत्रिणींचा ग्रुप करून दिला. आणि बघता बघता म्हातारी स्मार्ट आजी झाली. आता तर ती ५ ग्रुप ची ऍडमिन होती. दिवसाचे ३-४ तास बरे जायचे. आणि आता व्हाट्स  अँप बंद होणार. २ दिवसापासून ती बैचैन होती. त्यात हुकमी एक्क्याची नेमकी परीक्षा. बंडू पेपर संपवून आला आणि आजीने त्याच्या ताबा घेतला.

आजी : “बंड्या तुला काही चहा / कॉफी हवंय का? माझं एक काम आहे तुझ्याकडे. ते व्हाट्स ऍप बंद पडणार आहे. ते त्याच्या काय टर्म्स कंडिशन्स आहेत ते मंजूर कर. त्याचे काही पैसे-बैसे असतील तर ऑनलाईन भर. मी तुला लगेच देते आणि वर तुझी १०० रु करणावळ.”

बंड्या : “ते आधीचे १०००० राहिले आहेत.”

आजी : “गप रे मेल्या. या वेळी नक्की देईन पण ते तुझं काय ते डाउनलोड, इन्स्टॉल कर.  तो तुझा “झबलं बर्गर” काय परवानगी मागेल ती देऊन टाक.”

बंड्या :  “आजी, “झबलं बर्गर ” नाही गं, “मार्क झुकेरबर्ग ”

आजी : “हा..तेच ते…तू आधी मला ते काय ते करून दे..माझं व्हाट्स ऍप बंद नाही झालं पाहिजे.”

बंड्या : “पण आजी, तुला काही तुझ्या प्रायव्हसी ची काळजी आहे का नाही.”

आजी : “डोम्बल्याची प्रायव्हसी. अरे लग्न झालं तेव्हा दोन खोल्यांचा संसार. बाहेर मामंजी आणि सासूबाई. अशात सुद्धा ७ वर्षात ४ मुलं झाली. मला नको सांगू त्या प्रायव्हसी चं कौतुक. दे त्याला मान्यता.”

आजीच्या स्पष्टवक्तेपणाने आजची तरुण पिढीही क्लीनबोल्ड झाली. तरी पण स्वतःला सावरून बंड्याने आजीला समजावण्याचा प्रयत्न केला.

बंड्या : “आजी तशी प्रायव्हसी नाही, तुझ्या माहितीची सिक्युरिटी आणि प्रायव्हसी. पण तुला नक्की काय होतंय ते कळलंय का? तो तुझा “झबलं बर्गर” तुझे मेसेजेस वाचणार आणि वापरणारही.”

आजी : “मग वाचू देत की, त्यात काय बिघडलं. मी तुझ्या एवढी होते तेव्हा आमच्या वाड्यातल्या कित्येकांची पत्रे तो पोस्टमनच वाचून दाखवायचा. ते सुद्धा जाहीररीत्या. वाड्यातल्या चौकात.  अरे तुझे आजोबा २ वर्ष नोकरीला मुंबई ला आणि मी नगरला एकटीच. महिन्याला मनिऑर्डर यायची. तो पोस्टमन दारातूनच ओरडत यायचा. “वाहिनी या महिन्याला १०० ची आली”. सगळ्या वाड्याला कळायचं. अरे ६ महिन्यांनी १०० चे १५० झाले आणि त्या खडूस मालकांनी भाडं वाढवलं बघ.  अरे तुझ्या बापाच्या वेळेला माझ्या बाबांनी तार केली तर तो शहाणा तारवाला येताना पेढे घेऊन आला. वाड्याच्या चौकात सगळ्यांना बोलावून आनंदाची बातमी दिली. मग आजोबांच्या हातात तार दिली आणि पेढ्याचे ५ रुपये मागितले.

वाचुदे त्या बर्गरला माझी माहिती, काही बिघडत नाही. आणि वाचून काय वाचणार “गुड मॉर्निंग”, “गुड इव्हनिंग”, “गुड नाईट”. फॉरवर्ड केलेल्या कविता, काही  लेख, शुभेच्छा आणि सांत्वन. काय मेला फरक पडतो. उलट त्या तुझ्या “झबलं बर्गर” च्या ज्ञानात जरा भर पडेल.”

आजीला व्हाट्स ऍप हवंच होत. तिच्या कडे सगळ्याची उत्तर होती. तरीपण बंड्याने अजून एक प्रयत्न करायचा ठरवलं.

बंड्या : “आजी तसं नाही. तो तुझी माहिती नुसती  वाचणार नाही.  वापरणार सुद्धा.  म्हणजे विकणार सुद्धा.”

आजी : “विकूदे  विकलीतर.  त्यालाही संसार आहे. बायका, पोरं असतील. मिळाले चार पैसे माझ्या माहितीतून तर मिळूदेत त्या बिचाऱ्या ‘बर्गर” ला. नाहीतरी इतके दिवस व्हाट्स ऍप फुकट देतोय बिचारा. असा माणूस मिळत नाही हो. अरे तो तुझा देव सुद्धा तपश्चर्या केल्याशिवाय आशीर्वाद देत नाही. मिळवले चार पैसे तर कुठे बिघडलं. पण का रे बंड्या तो ती माहिती वापरणार कशी आणि पैसे कसे मिळवणार.?”

बंड्याला परत आशेचा थोडा किरण दिसला.

बंड्या : “हे बघ आजी म्हणजे..आता तू पर्वा निताताई ला शुभेच्छा पाठवल्यास ना डोहाळजेवणाच्या. तो मार्क झुकेरबर्ग आता त्या नीता ताईचा नंबर इन्शुरन्स कंपन्यांना देणार आणि त्या बदल्यात पैसे घेणार.  मग त्या इन्शुरन्स कंपन्या बरोबर १-१.५ वर्षांनी निताताईला “चिल्ड्रेन्स प्लॅन” विकणार. म्हणजे तसा प्रयत्न करणार त्यातून त्यांना पैसे मिळणार. किंवा तू राहुल दादा ला परवा मेसेज केलास ना “घर असावं घरा सारखं..नकोत नुसत्या भिंती…”त्यावरून ते अंदाज लावणार की राहुल दादाने नवीन घर घेतलं आहे. मग राहुलदादाचा नंबर ते बँकांना देणार आणि मग बँका त्याला लोन हवंय का..आमच्या ह्या स्किम आहेत म्हणून फोन करणार. असं गौडबंगाल असतं त्या मागे.”

आजी : “एवढच ना. मग काही प्रॉब्लेम नाही. कोणी काही विकेल रे पण आपल्या गरजा आपल्याला ओळखता आल्या पाहिजेत ना.  अंथरूण पाहून पाय पसरावेत. किंवा तुझ्या भाषेत उंटांचा मुका घ्यायला जाऊ नये. आणि समजा आले माझ्याकडे काही विकायला तर येवू देत. अरे बोहारीण पण कधी माझ्या वाट्याला गेली नाही. मुकाट मी दिलेल्या कपड्यात मागितलेलं भांड द्यायची. हे काय गंडवतात मला. तू कर रे ते नवीन व्हाट्स ऍप  इन्स्टॉल बिनधास्त कर. माझी जबाबदारी”

आणि बंडया ते FB काय असतं रे? सगळ्या व्हाट्स ऍप च्या त्या मेसेज मध्ये FB चा पण उल्लेख होता म्हणून विचारले.

बंड्या : “अग ते दोघे भाऊ भाऊ आहेत असं समज. FB हा व्हाट्स ऍप सारखा दुसरा कम्युनिकेशन प्लॅटफॉर्म आहे किंवा तुझ्या भाषेत सोशिअल-मिडिया. आता FB ने व्हाट्स ऍप ला विकत घेतलंय आणि ते म्हणतात की आपण आपापल्याकडची माहिती एकमेकांना शेअर करायची.”

आजी : “भाऊ -भाऊ च ना.  एकाच घरचे तर आहेत. कुठे बिघडलं माहितीची देवाण घेवाण केली तर. द्यावं रे बाबा..मोकळ्या मनाने आणि सढळ हाताने द्यावं.  म्हणजे समोरचा पण विश्वासाने आणि कृतज्ञतेने वापरतो. माझी आई सांगायची मला. असो. पण बंड्या त्या FB वर पण नवीन अकाऊंट काढावं लागतं का ? का अजून एक फोन घ्यावा लागेल??”

बंड्याने पुढचा धोका ओळखला आणि आजीला म्हणाला.

बंड्या : “तुला सांगितलं ना की दोघं, व्हाट्स ऍप आणि FB एकाच घरचे आहेत. एका ठिकाणी अकाउंट असलं की ते दुसरीकडे काढू देत नाहीत. नाहीतर तू बसशील स्वतःशीच बोलत या अकाउंट वरून त्या अकाउंट वर.”

हे मात्र आजीला पटलेलं दिसलं.

आजी : “भलता चलाख आहे रे तुझा “झबलं बर्गर”. हुशार दिसतोय. चांगला खोडा घालून ठेवला. पण मग तुझी ती “स्वीटू” तुला व्हाट्स ऍप वर मेसेज पाठवते आणि तू त्या “स्वीथ्री” बरोबर FB वर कनेक्ट असतोस ते कसं”

बंडया : “आजी माझ्या क्लास ची वेळ झाली, हा प्रश्न तू दीदी ला विचार.”

आणि बंड्या पसार झाला पण आता बहुदा त्यालाही क्लॅरिटी आली होती… व्हाट्स ऍप वरून स्विच व्हायचं का नाही.

होप, हे वाचून तुम्हाला पण येईल.

योगिया From Facebook

                                                                           (श्री योगेश गोखले यांच्या फेसबुक वॉलचे सौजन्याने)
© श्री योगेश गोखले 

ईमेल – ygokhale@hotmail.com

मोबा. – ९८८१९ ०२२५२

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ बालपणीच्या आठवणी…भाग-1 – खजिना ☆ सौ. अमृता देशपांडे

सौ. अमृता देशपांडे

☆ मनमंजुषेतून ☆ बालपणीच्या आठवणी…भाग-1  – खजिना ☆ सौ. अमृता देशपांडे ☆ 

ब-याच वर्षानंतर मनात बालपणीच्या आठवणी रुंजी घालू लागल्या. विचार केला लिहून काढू. लिहिता लिहिता सगळा खजिना हाताशी लागला. आठवणींनी शब्दांचं रूप घेतलं, ” खजिना”  खुल जा सिम सिम म्हणून अवतरला.

खजिना – 1

रात्रीची जेवणे झाली.  आई स्वयंपाक घरातली आवरा आवर करून येईपर्यंत आम्ही दुस-या दिवशीची दप्तरे भरून,  शाळेचे युनिफाॅर्म वगैरे ची तयारी करून अंथरूणे घालायचो. आणि मग आमच्या टिवल्या बावल्या चालायच्या. तोपर्यंत बाबा पण दुस-या दिवशीची कामाची तयारी करणे, डायरीत  हिशेब नोंद करणे अशी कामे आटोपून घ्यायचे.

आई आली की आम्ही आपापली अंथरूण पटकावायचो. पुढचा एक तास हा फक्त कथा श्रवणाचा असे. रोज रात्री बाबा पु.ल.देशपांडे,  द.मा.मिरासदार, शंकर पाटील  यांच्या कथा, व्यक्तीचित्रे वाचून दाखवत.

मुळात लेखक नावाजलेले,  लेखन दमदार, त्यात बाबांचं वाचन म्हणजे ऐकणा-याला निखळ आनंद मिळत असे. पु.लंची अनेक व्यक्तीचित्रे, गणगोत, व्यक्ती आणि वल्ली,  पूर्वरंग, अपूर्वाई अशी प्रवासवर्णने आम्ही बाबांच्या बरोबर स्वतः अनुभवली आहेत. शंकर पाटलांच्या ग्रामीण कथेतील उसाचा हिरवागार मळा, गार गोड पाण्याची विहीर, त्यावरची मोट, तिचा कुई कुई आवाज, पखालीतलं पाणी पाटात पडल्यावर वहाणारा खळाळता झरा, हे सर्व बाबांच्या अस्सल ग्रामीण वाचन शैलीतून अनुभवलं आहे.

वर्णनात्मक उतारे वाचताना ते कंटाळवाणं कधीच वाटत नसे.कारण वाचनाच्या चढ-उतारा तून प्रत्येक शब्द आणि वाक्य जिवंत होत असे. वाचताना मध्येच आलेले संवाद सुरू करण्यापूर्वी बाबा एक pause घ्यायचे. त्यामुळे नकळत संवादाची चाहूल लागायची. आणि गोष्टी ची लज्जत वाढायची. गोष्ट संपता संपता आम्ही चौघेही निद्रादेवी च्या पांघरूणात गुडुप झोपी गेलेलो असायचो.

अशा अनेक पुस्तकांचं सामूहिक वाचन आम्ही केले आहे. वाचनाचे संस्कार नकळत आमच्यात रुजले.  पुढे मुलांना गोष्ट वाचून दाखवताना ही आठवण झाली. आणि जाणवलं, माझंही वाचन बाबांसारखंच होतंय की.. त्यांच्या इतकं छान नाही जमत पण मला वाचताना आणि मुलांना ऐकताना आनंद मिळतोय, तो काय कमी आहे?

स्पष्ट उच्चार, ठणठणीत आवाज, शब्दांची अर्थपूर्ण  पेशकश,  पल्लेदार वाक्ये,  बोली भाषेतला गोडवा आणि हे सर्व सादर करणारी बाबांची रसाळ वाणी.

जिभेवर ओघवत्या सरस्वतीचं स्थान, डोळ्यात श्री गणेशाचे आश्वासक भान, प्रसंग आणि व्यक्तिरेखा सजीव करणारे बाबांचे वाचन या सर्वांचा मिलाफ म्हणजे आनंदाचे सुख- निधान!

क्रमशः…

© सौ अमृता देशपांडे

पर्वरी- गोवा

9822176170

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ शाहू महाराजांचे प्राणीप्रेम: गजराज मोतीची शस्त्रक्रिया-1 ☆ संग्राहक – सौ.अस्मिता इनामदार

सौ.अस्मिता इनामदार

 ☆ इंद्रधनुष्य ☆ शाहू महाराजांचे प्राणीप्रेम: गजराज मोतीची शस्त्रक्रिया-1 ☆ संग्राहक – सौ.अस्मिता इनामदार ☆ 

छत्रपती शाहू महाराजांकडे जवळपास अडीचशे हत्ती होते. पैकी “गजराज मोती” हा महाराजांचा विशेष आवडता हत्ती होता. शिवाय तो अत्यंत भव्य व रुबाबदार होता, त्याचे शुभ्र वळणार दात दिलखेचक होते त्यामुळे तो छत्रपतींचा मानाच्या अंबारीचा हत्ती होता. गजराज मोती माजात आलेला असल्यामुळे राधानगरी येथे त्याला साठमारीच्या मैदानात उतरविण्यात आले. साठमारांनी व्यूहरचना केली व मोतीचा माज उतरविण्यासाठी ते पुढे सरसावले. खुद्द महाराज हा खेळ पाहण्यासाठी उपस्थित होते. साठमार रुमाल नाचवित मदमस्त मोतीला छेडू लागले. मोती प्रचंड चवताळला व एका साठमाराला हेरुन भयानक चित्कार करीत त्याच्या मागे धावू लागला. उपस्थितांच्या पोटात भितीने गोळा उठला. काहीतरी विपरीत घडणार असे महाराजांसह सर्वांनाच वाटू लागले. साठमार वायुवेगाने पुढे पळत होता व जोराचा चित्कार करीत चवताळलेला मोती त्याच्या मागे धावत होता. “मोतीने साठमाराला सोंडेत पकडले. गरगर फिरवून त्याला जमिनीवर आपटले आणि पायाखाली एक तंगडी धरुन सोंडेने दुसरी तंगडी फासकटली.” असे भेसूर चित्र उपस्थितांच्या मनपटलावर तरळले तोच साठमार चपळाईने समोरच्या दिंडीत घुसला. त्याचा मागून वायुवेगाने धावत येणारा मोती जोराने बुरुजावर आदळला त्यासरशी कडाड् कड असा मोठा आवाज झाला. त्यातच काळीज चिरुन जाणारा मोतीचा आर्त चित्कार पाठोपाठ उमटला. मोतीच्या तोंडातून रक्ताचा लोट वाहत होता. मोतीचा एक दात मोडला होता. दाताच्या आतील मांसल गोळा लोंबकळत होता. ते भयानक दृश्य पाहवत नव्हते. तोच गगनभेदी टाहो फुटला, “महाराज घात झाला. माझ्या मोतीचा दात तुटला.” असा आक्रोश करीत अंबादास माहूत मैदानात धावला. पिसाळलेल्या हत्तीसमोर जात असलेला भावनाविवश अंबादास पाहून महाराजांना धोक्याची जाणीव झाली. “अंबादास थांब. मोती पिसाळलाय, त्याच्यासमोर जाऊ नकोस.” असे म्हणतच महाराजांनीही मैदानात उडी ठोकली. तोपर्यंत अंबादास मोतीच्या सोंडेला बिलगून अश्रू ढाळीत उभा होता. प्रचंड पिसाळलेला तो भव्य गजराज मोतीसुद्धा सोंडेने अंबादासला वेढा घालून अश्रू ढाळीत शांतपणे उभा होता. तशाही स्थितीत हत्ती-माहूताचे प्रेम पाहून व आपल्या आवडत्या मोतीची भेसूर जखम पाहून महाराजांच्याही डोळ्यांत अश्रू तरळले. पण हत्ती पिसाळलेला होता. या स्थितीत तो काहीही करु शकतो हे जाणून महाराजांनी अंबादासला बाजूला घेतले व हत्तीला चिमटे लावून ठाणबंद केले. त्याच्या जखमेवर प्राथमिक उपचार केल्यानंतरच महाराजांनी मैदान सोडले.

दुसऱ्या दिवशी पहाटे महाराज व्हेटर्नरी सर्जन सावर्डेकर यांना घेऊन हत्तीठाणावर आले. डॉ. सावर्डेकरांनी मोतीला तपासले. तुटक्या दाताच्या पोकळीतील लोंबकळणारे मांस त्यांनी कापून टाकले. “तुटक्या दाताची वाढ होते काय?” महाराजांनी विचारले.

“नाही” डॉक्टरांनी सांगितले.

“दुसरा काही मार्ग?”

“दुसरा कुठलाच मार्ग नाही. दात मोडल्यामुळे दात्र्या पडल्या आहेत. त्या भारी खूपत असणार. तोंडातील जखम व खुपणाऱ्या दात्र्यांमुळे हत्ती सदा विव्हळत राहणार.”

“मग त्या दात्र्या तरी काढून टाका.” महाराज म्हणाले. त्यावर त्या काढता येणार नाहीत शिवाय यापुढे हत्तीवर इलाज करता येणार नाही असे डॉक्टरांनी सांगितले.

क्रमशः…

संग्राहक – सौ अस्मिता इनामदार

पत्ता – युनिटी हाईटस, फ्लॅट नं १०२, हळदभवन जवळ,  वखारभाग, सांगली – ४१६ ४१६

मोबा. – 9764773842

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ माझी वाटचाल…. मी अजून लढते आहे – 12 ☆ सुश्री शिल्पा मैंदर्गी

सुश्री शिल्पा मैंदर्गी

☆ मनमंजुषेतून ☆ माझी वाटचाल…. मी अजून लढते आहे – 12 ☆ सुश्री शिल्पा मैंदर्गी ☆

सौ.अंजली गोखले 

(पूर्ण अंध असूनही अतिशय उत्साही. साहित्य लेखन तिच्या सांगण्यावरून लिखीत स्वरूपात सौ.अंजली गोखले यांनी ई-अभिव्यक्ती साठी सादर केले आहे.)

माझी एम ए अभ्यासाची घोडदौड सुरु झाली, पण मला एंट्रन्स ची परीक्षा पास झाल्याशिवाय एम ए ला प्रवेश मिळणार नव्हता.. ताईंनी माझी कसून तयारी करून घेतली आणि मी एन्ट्रन्स ही पास झाले.माझ्या मनामध्ये संमिश्र प्रकारच्या भावना होत्या. एका बाजूला उत्सुकता आणि आनंद र दुसर्‍या बाजूला अभ्यासाची जबाबदारी.एकीकडे आई-बाबांच्या तब्येतीची खूपच काळजी लागून राहिली होती.तसं बघायला गेलं तर ताईंना आणि मला ना हे शिवधनुष्य पेलायचे होतं आणि आम्ही ते यशस्वीपणे पेललही !

नृत्याच्या सुरूवातीच्या दिवसातला आणि आत्ता चा अभ्यास,रियाज यामध्ये जमीन अस्मानाचा फरक होता.आता शारीरिक आणि मानसिक हालचालींच्या माध्यमांमधून प्रेक्षकांपर्यंत भावभावना पोहोचवायच्या होत्या.शारीरिक हालचाली म्हणजे अंग, प्रत्यांग आणि उपांग.अर्थात हात पाय मस्तक ही अंगे,हाताचे पंजे बोटे कोपरे खांदे ही प्रत्यां गेआणि डोळे डोळे पापण्या ओठ, नाक, हनुवटी ही उपांगे.यांच्या हलचाली मधून आणि आणि मनामध्ये उठणाऱ्या भावतरंग यांमधून अभिनय सहज आणि सोप्या माध्यमातून मला प्रेक्षकांपर्यंत पोचवायचा होता.अर्थातच हे माझ्यासाठी खूप कठीण होते आणि त्यामध्ये मनाच्या एकाग्रतेची गरज होती.

नृत्याच्या सुरुवातीच्या काळामध्ये ताई मला स्पर्शाने मुद्रा शिकवत असत.त्याचे एक सांकेतिक भाषा ठरलेली असे. स्पर्शाने मुद्रा जाणून हे मी सहज आत्मसात केले होते आणि ती सवय माझ्या अंगवळणी पडली होती. आता मात्र मला नृत्यातल्या, अभिनयाचे कौशल्य, त्यातली खुबी अधिक सफाईदारपणे प्रेक्षकांच्या मनावर बिंबेलअशा पद्धतीने मांडायची होती आणि तीही संगीताचा आधार घेऊन.कारण नृत्याच्या सुरुवातीच्या काळामध्ये एखादी शेजारी उभी असणारी व्यक्ती मला दोन हात बाजूला करून, नुसते बोट दाखवूनही दाखवता येत असे. पण आता मात्र या दोन्ही बरोबर मान आणि नजर त्या बाजूला चेहऱ्यावरील हावभाव सहित प्रेक्षकांना ती दाखवायची होती. माझ्या बाबतीत नजर हा मुद्दा नव्हताच मुळी. फोन मला परीक्षक आणि प्रेक्षक यांना ही गोष्ट अजिबात जाणवू न देता माझी कला, नृत्य सादर करायचे होते. त्यातही मी बाजी मारली.

माझ्या या अभ्यासाला मला सर्वात जास्त आवडलेली रचना म्हणजे अभिनयावर आधारित असलेले “कृष्णा  नी बेगनी बारू” (कन्नड – अर्थ – कृष्णा तू माझ्याकडे ये.) या रचनेमध्ये मला यशोदेच्या मनातील भाव, मातृत्वाच्या भावभावना, बालकृष्णाच्या अवखळ लीलाअभिनयातून रंगवायच्या होत्या. यात बालकृष्ण रुसलेला आहे आणि त्याला मनविण्यासाठी यशोदा माता कधी लोण्याचा गोळा दाखवते तर कधी झेंडू खेळायला बोलावते. तर बाल कृष्ण तिला आपल्या अवखळपणानी

सतावतो आणि शेवटी त्याच्याच मुखात तिला म्हणजे मातेला विश्वदर्शन ही घडवतो. या दोन्ही भावभावना वेगळेपणाने दाखवणे ही माझ्यासाठी तारेवरची कसरत होती. मी ती नृत्यामध्ये रंगून जाऊन, तन मन अर्पून केली आणि त्या  अभिनयासाठी फक्त परिक्षकानीच नाही तर प्रेक्षकांनी सुद्धा भरभरून दाद दिली.

…. क्रमशः

© सुश्री शिल्पा मैंदर्गी

दूरभाष ०२३३ २२२५२७५

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ आनंदाचे डोही ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

☆ मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ आनंदाचे डोही ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई ☆

असं ऐकलं होत की अमरनाथ दर्शनाचे फळ काशीच्या दहा पट, प्रयागच्या त्रिवेणी संगमाच्या शंभरपट,आणि कुरुक्षेत्राच्या 1000 पट इतकं त्याचं महत्त्व आहे. त्यामुळे अमरनाथला जाण्याबद्दल एक कुतूहल आणि जिज्ञासा होती. तीव्र इच्छा असली की योग जुळून येतो. आणि तसंच झालं.

ऑगस्ट 1999 सालची गोष्ट. रोटरी क्लबने अमरनाथ, काश्मीर, वैष्णोदेवी यात्रा आयोजित केली होती. 187 जणांची  टीम निघाली. जम्मूला पोहोचल्यानंतर दुसरे दिवशी आमच्या बस जम्मुहून  पहाटे चार वाजता निघाल्या. जम्मू ते पहेलगाम 300 कि.मी. चा चौदा तासांचा संपूर्ण घाटाचा प्रवास होता. मी खिडकीत बसून सुंदर मनोहर निसर्गाचे नेत्रसुख घेत होते. वाटेत रामवनला खाणे पिणे झाले. बनिहाल ला जम्मू आणि काश्मिर यांना जोडणारा तीन किमीचा जवाहर टनेल. या बोगद्यावर काश्मीर पोलीस, बी एस एफ, आणि आर्मी यांचा कडक पहारा होता.  रात्री सात ते सकाळी सहा बोगदा बंद. त्यामुळे लवकर पोहोचणे गरजेचे होते. वेळेत बोगदा पार केला. आणि समोर काय वा वा निसर्ग देवतेचे सुंदर हसरं गोजिरवाण लावण्य रूप, जन्नत का नजारा  असं काश्मीर दिसायला लागलं. डोळे दिपून गेले. झेलम च्या काठावर वसलेलं अनंतनाग, तेथील डोलणारी भात शेती, लपतछपत खळखळत वाहणारी अरु नदी साथ करत होती. जागोजागी तपासणी केंद्रातून पार पडावं लागत होत. पहेलगामला पोचायला संध्याकाळ झाली. नंतर प्रथम सामानाची विभागणी केली. फक्त एक पाठीची सॅक बरोबर घ्यायची होती. व दुसरी बॅग परस्पर श्रीनगरच्या हाऊस बोटीत जाणार होती. रात्री झोपायला प्रत्येकाला स्लीपिंग बॅग दिल्या. पण रात्रीच्या मुसळधार पावसाने त्या  गारठून गेल्या. थंडीने झोपतर नाहीच लागली. पण उद्याचं काय ? हे प्रश्नचिन्ह समोर उभं राहिलं. अमरनाथालाच आवाहन केलं. त्याने आमच्या हाकेला  ओ दिली. आणि सकाळी सूर्यनारायणाच दर्शन झालं. सर्वानी  त्याला हात जोडले. सर्वांच्या चेहऱ्यावर हास्य पसरल. सूर्यनारायणाच्या साक्षीने छोट्या गाड्या मधून जाताना एकोणीस किमीचा अत्यंत अवघड आणि अरुंद घाट, लीडर नदीच रौद्र पात्र, भीषण खळाळणारा  फेसाळणारा दुधाळ  प्रवाह  पाहून जीव मुठीत घट्ट धरला होता. बहात्तरशे फूट उंची पासून  9 हजार पाचशे फूट उंचीवरील चंदन वाडी ला पोचलो. 50 ते 60 घरांचं इतकं छोटं गाव होतं ते. 15 ऑगस्ट चा दिवस होता.तिरंगा झेंडा फडकवला. आधाराची छडी घेतली. घोडे ठरवून निघालो. आता खऱ्या अर्थाने यात्रेला सुरुवात झाली.

“पाऊले चालती अमरनाथ वाट, जिज्ञासे भरिले  मन  काठोकाठ.” अशा भारावून गेलेल्या मनाने पिसू घाटीचा चढ चढणे सुरू झाले. मान पूर्णपणे आकाशाकडे करून पाहिलं की डोंगराच्या टोकावरील माणसे छोट्या बाहुली पेक्षा लहान दिसायची. आता आपण तिथं कधी पोहोचणार, असं म्हणत तिथे पोहोचलो की पुन्हा तीच पुनरावृत्ती. असं कितीदा तरी व्हायला लागलं. उंच उंच चढण, वाकडेतिकडे दगड गोटे यातून वाट काढत, आमचे ओझे पाठीवर घेऊन बिचारे घोडे चालत होते. रस्ता संपत नव्हता. शंकराला भेटायला जाणाऱ्या देवांचे दान वांशी झालेले युद्ध आणि त्यात देवांनी दानवांना  मारुन टाकून, त्यांच्या वाकड्यातिकड्या हाडांचा झालेला  ढीग म्हणजेही पिसू घाटी असं म्हणतात. तीन किमी चढून, अकरा हजार पाचशे फूट उंच असलेल्या पिसू टॉप वर पोचलो. आणि एक अवघड टप्पा फार केला. आता पुढील टप्पा शेषनाग.

उंच, खोल वाकडीतिकडी अरुंद पायवाट, वळणे वळणे असे मार्गक्रमण चालू होते. घोड्यावर बसूनही प्रत्येक श्वास महत्त्वाचा वाटायला लागला. थोड्याच वेळात निळ्याशार पाण्याचे सुंदर शेषनाग सरोवर, त्यातून वहाणारी शेषनाग नदी आणि त्याच्या आरक्षणाला उभा असलेला शेषनाग पर्वत दिसायला लागला. देवांना त्रास देणाऱ्या वायुरूपी राक्षसाला,शेषनागाने पाताळातून येऊन, सहस्त्र मुखांनी वायु ग्रहण करून, त्याचा वध केला. तोच पर्वत शेषनाग म्हणून अमर झाला. पुढे निघालो आणि शेषनागचे पत्त्याच्या बंगल्यासारखे, आमच्या मुक्कामाचे तंबू दिसायला लागले. हुश्श वाटलं. चंदन वाडी ते शेषनाग बारा किमी अंतर करायला सहा ते सात तास लागले. माझ्यासारख्या  प्राणीप्रेमीला घोडे आणि त्यांना धरून चालणारे घोडेवाले, यांच्याबद्दल खूपच सहानुभूती वाटायला लागली.आमच्यापेक्षा तेच पुण्यवान आहेत असं वाटायला लागलं. रात्री लंगरमध्ये अगदी सात्विक, राजसिक, उत्तम जेवण होते. पण तोंडावर ताबा ठेवला होता. आरोग्य सुविधा, प्रचंड कडाक्याची थंडी, झोपायला तंबू, त्यावर एक टांगलेला कंदील, शांत एकाकी वाटणारा आसमंत, विरळ हवा, बाहेर प्राणी पक्षांचे आवाज नाहीत अशा वातावरणात झोप झाली. सकाळी उठून पुढील टप्पा पंचतरणी.

सकाळी शेषनाग ते पंचतरणी असा पुन्हा 12 किमीचा प्रवास सुरू झाला. खडतर म्हणावा असा. वळणावळणातून दरीच्या कडेकडेने, पाय वाटेने पावले वाटचाल करीत होती. जागोजागी जवान होते. हसतमुखाने त्यांच्या लंगर मध्ये “चहा तरी घ्या ” असा आग्रह करत होते. “जय जवान” “जय जवान”, म्हणून आम्ही त्यांना आदरणीय हाका मारत होतो. जाणाऱ्या येणाऱ्या प्रत्येकाच्या तोंडून “ओम नमः शिवाय” ” बम बम भोले” ” जय जय भोले “, उच्चार तोंडून येत होते. सर्वजण उत्साहात दिसत होते. महागुनाजपास या सर्वोच्च उंचीवरील, 14800 फूट या ठिकाणी पोहोचलो. पुढे अर्धा कि.मी. वर  पाबीपाल  आणि थोडे पुढे पोषपत्रीला थोडी विश्रांती घेतली. सर्वत्र बर्फाच्छादित डोंगर दिसत होते. मेंढीच्या दुधाचा बिन साखरेचा, काश्मिरी चहाची चव  चाखायला मिळाली. थोड्याच वेळात पंचतरणीच्या कॅम्पचे तंबू दिसायला लागले. पोषपत्री ते पंचतरणी अंतर पूर्णपणे दगडा दगडातून कापत १४८०० फुटावरून १२०००फूट उतारावर आलो. वाटेत तुषार उडवत वाहणारे झरे, -झुळझुळ वाहणारे थंडगार पाणी पाहून मन तृप्त होत होते. दुरूनच रुंदच्या रुंद  पंचतरणीच पात्र  दिसलं. खरंतर पाच नद्यांच्या संगमाने तयार झालेल्या नदीचे पात्र हे गोठलेलं ग्लेशियर असत. पण बर्फ वितळायला लागल्यामुळे पात्र ओलांडायला त्रास झाला नाही. रात्री उत्तम जेवणाचा आस्वाद घेतला. पंचतरणीच्या अंगाई गीताने निद्रा देवतेच्या अधीन झालो. आणि सकाळी तिच्याच  गाण्याच्या भूपाळीने जाग आली. आता पुढील सात कि.मी. चा अर्ध्या दिवसाचा टप्पा,

पंचतरणी ते अमरनाथ गुहा. असाच खडबडीत मार्ग. दोन तासात संत सिंग पहाडी आणि तसेच पुढे चार किमी पूर्ण गलेशियार. अमरगंगा नदी कधी समोर उभी ठाकायची, कधी डोंगराला ठोसा देऊन भगदाड पाडायची. मधूनच लपाछपी करायची. अवखळ मुलीसारखी, लांब उंच उड्या मारत नाच करायची. अमर गंगेची अशी रूप न्याहाळत गुहा कधी दिसायला लागली हे कळलंच नाही. गुहेच्या पायथ्यापासून चारशे पायऱ्या पायी चढून 13500 फुटावर जायचे होते. अमरनाथाच्या ओढीने तोही चढ कसा पार झाला लक्षातच आलं नाही. पहातो तो काय! महाकाय आणि प्रचंड बर्फाचं शिवलिंग! पूर्ण समर्पित होऊन हात जोडले. डोळ्यात कृतकृत्यतेचे  भाव आले. आणि आनंदाश्रू तरळले जायला लागले. आनंदाला शब्द नव्हते. देवदेवतांना मृत्यूपासून रक्षण करून त्यांच्यावरील प्रेमाने द्रवीभूत झालेल्या, रसमय शिवलिंगाचे, बाबा बर्फानीचे दर्शन हव  होत  ते मिळालं. शिवाने डोक्यावरून खाली घेऊन, पिळलेल्या चंद्रातून निघालेल्या अमृतधारेच -अमरगंगेच तीर्थ बरोबर घेतलं. वरती  फडफड आवाज आला. म्हणून पाहतो तो, दोन कबुतर शंकराला नृत्य समयी कुरकुर करणाऱ्या शिष्यांना, दिलेल्या शापाने झालेली ही ती कबूतर.काय खात पीत असतील कुणास ठाऊक !तेथेच असलेल्या बर्फमय पार्वती आणि गणेशाचं दर्शन घेऊन, तृप्त मनाने गुहेतून बाहेर पडलो.परतीचा रस्ता संगम टॉपला पोचलो. मोहम्मद अली आणि फारुख घोडेवाले यांना बक्षीस दिली. त्यांचे आभार मानले.घोड्यांच्या अंगावरून हात फिरवून निरोप घेतला.आता पुढील बालताल च्या वाटेला दुसरे घोडे ठरवले.

©  सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

बुधगावकर मळा रस्ता.

मिरज.

मो. ९४०३५७०९८७

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – सूर संगत ☆ सूर संगत (भाग – १३) – ‘ए, मन – यमन’ ☆ सुश्री आसावरी केळकर-वाईकर

सुश्री आसावरी केळकर-वाईकर

☆ सूर संगत (भाग – १३) – ‘ए, मन – यमन’ ☆ सुश्री आसावरी केळकर-वाईकर ☆  

असं म्हणतात कि, पूर्वी `यमन’ रागाचं नाव `एमन’ असं होतं… ज्याची फोड केली असता ‘ए, मन’ असं असल्याचं जाणवेल… म्हणजे स्वत:च्याच मनाशी साधलेला संवाद! पुढे `एमन’ ह्या शब्दाचा अपभ्रंश होत `यमन’ असं नाव रूढ झालं. हा जो काही एकत्रित स्वरसमूह आहे त्यातून स्वत:च्याच मनाशी होणाऱ्या संवादाचा प्रत्येक भावरंग उत्तमप्रकारे प्रकट होतोच, ही किमया संगीतज्ञांनी अनुभवली असेल आणि म्हणून ह्या स्वरसमूहालाच त्यांनी `एमन’ असं नांव दिलं असावं. मराठीत ‘अरे मना’ असा ‘ए,मन’चा अर्थ होईल. म्हणजे आपल्या मनाला उद्देशून काही सांगणं.

ज्यावेळी भावनेचा एखादा रंग आपण पराकोटीच्या पातळीवर अनुभवतो तेव्हांच आपण अंतर्मुख होतो, स्वत:च्या मनाशी संवाद साधतो. हा संवाद नेमकेपणी साधला जाण्यासाठी प्रत्येकवेळी ‘एमन’च्या/यमनच्या सुरांची आळवणी उपयुक्त ठरते ही अनुभूती सूरसाधकांनी घेतली असेल म्हणून रागालाच म्हटलंय ‘ए, मन’… केवढा सार्थ विचार! काही ठिकाणी असाही उल्लेख आढळतो कि, यमन असा अपभ्रंश होण्यापूर्वी त्याचं नांव ‘इमन’ असं होतं. ‘इमन’चा अर्थ पाहायला गेलो तरी ‘इ मन’ म्हणजे ‘हे मन’ असा होईल… इथे दोन प्रकारे विचार करता येईल. ‘इ मन’… म्हणजे पुन्हा ‘अरे मना’ असं मनाला उद्देशून किंवा ‘इ मन’ म्हणजे ‘हे मन’ म्हणजे समोरच्याला जणू सांगणं आत्ता ह्या सुरांतून जे प्रकट होतंय हे माझं मनच आहे… जणू माझं अख्खं मन इथं उतरलं आहे ह्याअर्थी!

ह्या अर्थाचा विचार करताना एक निश्चित जाणवेल कि मनाची अवस्था नेमकेपणी व्यक्त करणारे ते यमनचे सूर आणि म्हणूनच नवरसांपैकी कोणताही भाव यमनच्या सुरांतून उत्तम प्रकारे व्यक्त होऊ शकतो. याआधीही आपण पाहिलं आहे कि, एखाद्या रागाची प्रकृती गंभीर आहे असं म्हटलं जातं तर एखाद्याची चंचल! मात्र यमनचे सूर भावाभिव्यक्तीच्या दृष्टीनं कोणतीही चौकट आपल्याभोवती आखून घेत नाहीत. काहीवेळा, एखाद्या रागाला तो अमुक प्रकारचा रस उत्पन्न करतो असं म्हणणं खूप सापेक्ष वाटतं. बंदिशीतलं साहित्य, त्याचा अर्थ, त्याच्या स्वररचनेची ठेवण आणि रागप्रकटीकरण करत असतानाची कलाकाराची मनोवस्था ह्या सर्वच गोष्टी कलाकृतीतून होणाऱ्या रसोत्पत्तीसाठी कारणीभूत असतात. त्यामुळं काहीवेळा रूढार्थानं केलेलं विधान सार्थ ठरतही नाही.

मात्र ह्याहीवेळी पुन्हा एका मुद्द्यावर येईन कि, मानवाच्या जाणिवा अत्यंत सूक्ष्म रूपातही जागृत असताना प्रयोग करून मांडल्या गेलेल्या मतांना काहीतरी अर्थ नक्कीच असणार. त्यांचा अनमान करायला मन धजत नाही. कदाचित रागाकडे अत्यंत सूक्षमतेनं पाहाण्याचा आवाका असणाऱ्यांना हे अर्थ जास्त नेमकेपणी उमजत असतीलही. माझ्यासारख्या सामान्य कलाकारालाही ढोबळमानानं काही अनुभूती येत असतेच. पण क्वचित कधी दुसऱ्या मताचाही विचार करावा का? असं वाटणारेही क्षण येतातच. मनात येतं, इथं कदाचित रागाच्या अंतरंग आणि बाह्यरंगाची गफलतही आपल्याकडूनच होत असावी. असो, पण यमनच्या बाबतीत मात्र हे द्वंद्व उरत नाही ह्याचं कारण म्हणजे त्याचं सर्वसमावेशक असणं!

ह्याच रागाचं नाव कल्याण असंही आहे आणि म्हणूनच हा कल्याणथाटाचा जनकराग आहे. एक लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे ह्या रागाचं नांव एकतर यमन म्हणावं किंवा कल्याण म्हणावं. मात्र ‘यमनकल्याण’ नावाचा राग मात्र नुसत्या ‘यमन’ किंवा ‘कल्याण’ रागापेक्षा वेगळा आहे. मागे पाहिल्यानुसार कल्याण थाटाचे स्वर म्हणजे म तीव्र आणि बाकीचे सर्व स्वर शुद्ध ह्या रागातही तसेच आहेत. नि रे ग म(तीव्र) ध नि सां असा आरोह तर सां नि ध प म(तीव्र) ग रे सा असा रागाचा अवरोह आहे. उत्तमप्रकारे यमन आळवणाऱ्या कलाकाराने उभ्या केलेल्या रागरूपात ‘ग’ आणि ‘नि’ ह्या त्याच्या वादी-संवादी स्वरांचं चिंब ओलेतं रुपडं अगदी खुलून दिसतं… म्हणजे त्याक्षणी रागातून जी रसोत्पत्ती होत असेल त्यात हे सूर अगदी चिंब भिजून जास्त जास्त खुलून आलेले जाणवतात. अर्थातच त्यांना गुंफत राहाणाऱ्या बाकीच्या स्वराचं त्यांना पोषक असणंही महत्वाचं! रात्रीच्या पहिल्या प्रहरी गायल्या जाणाऱ्या ह्या रागाचे आरोह-अवरोह पाहाता रागाची जाती षाडव-संपूर्ण असल्याचं लक्षात येईल.

‘प्रभाती सूर नभी रंगती’ सारखी रचना असेल, ‘कबिराचे विणतो शेले’, ‘अधिक देखणे तरी निरंजन पाहाणे’, ‘टाळ बोले चिपळीला नाच माझ्या संग’, ‘नामाचा गजर गर्जे भीमातीर’ ‘पांडुरंगकांती दिव्य तेज झळकती’, ‘प्रथम तुला वंदितो कृपाळा’, ‘राधाधरमधुमिलिंद जयजय’ किंवा ‘समाधिसाधन संजीवन नाम’ सारख्या भक्तिरसातल्या रचना असोत, ‘आकाशी झेप घे रे पाखरा, सोडी सोन्याचा पिंजरा’, ‘देवाघरचे ज्ञात कुणाला विचित्र नेमानेम’ सारखे जीवनातली सत्य अधोरेखित करणारे शब्द असोत, ‘कशी केलीस माझी दैना, मला तुझ्याबिगर करमेना’, ‘का रे दुरावा का रे अबोला’, ‘भय इथेल संपत नाही’ ‘लागे हृदयी हुरहुर’ सारख्या काळजाची हुरहुर व्यक्त करणाऱ्या रचना असोत, ‘एकला नयनाला विषय तो झाला’, ‘नाथ हा मोही खला’, ‘सुकांत चंद्रानना पातली’ सारखी प्रसंगाला साजेशी नाट्यपदं असोत, ‘जिथे सागरा धरणी मिळते’, ‘जीवनात ही घडी अशीच राहुदे’, ‘तोच चंद्रमा नभात’, ‘धुंदी कळ्यांना धुंदी फुलांना’ सारखे प्रीतभावनेने ओथंबलेले शब्द असोत किंवा ‘पिकल्या पानाचा देठ कि हो हिरवा’ ही रांगड्या बाजाची लावणी असो… ह्यातल्या प्रत्येक शब्दाचा भावरंग यमनने केवळ आपल्या अनुपम सौंदर्याने खुलवला नाही तर त्याला पुरेपूर न्यायही दिला आहे.

अर्थातच काही रचनांमधे किंचित इतर सुरांचा वापर आणि पुढे कदाचित एखादं पूर्ण वेगळं वळण असू शकणं हे उपशास्त्रीय किंवा सुगम संगीतात सामावून जाणारं आहे. तर, मनाचा प्रत्येक रंग चपखलपणे उलगडून दाखवणाऱ्या यमनचा आवाका मानवी मनासारखाच प्रचंड व्यापक आणि अथांग आहे.

 

© आसावरी केळकर-वाईकर

प्राध्यापिका, हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत  (KM College of Music & Technology, Chennai) 

मो 09003290324

ईमेल –  asawarisw@gmail.com

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares