‘आनंदनिधान‘ या शब्दाचा अर्थ अतिशय सुंदर आणि आध्यात्मिक आहे. हा शब्द प्रामुख्याने दोन शब्दांनी बनलेला आहे. आनंद आणि निधान.
याचा सविस्तर अर्थ –
शब्दशः अर्थ आनंद, सुख, हर्ष किंवा प्रसन्नता.
निधान म्हणजे साठा, ठेवा, खजिना किंवा आश्रयस्थान.
त्यामुळे, ‘आनंदनिधान’ म्हणजे ‘आनंदाचा खजिना’ किंवा ‘ज्याच्याकडे आनंदाचा मोठा साठा आहे असा’.
व्यावहारिक आणि आध्यात्मिक अर्थ –
मराठी भाषेत आणि संतांच्या साहित्यात हा शब्द विशेषतः ईश्वर किंवा सद्गुरूंसाठी वापरला जातो.
ईश्वराचे स्वरूप: ज्याच्याकडून फक्त आनंदच मिळतो आणि जो स्वतः आनंदाचे माहेरघर आहे, असा तो ‘आनंदनिधान’ (उदा. प्रभू रामचंद्र किंवा श्रीकृष्ण).
पूर्णत्व: असा साठा जो कधीही संपत नाही. अक्षय आनंदाचा स्रोत.
वाक्यात उपयोग करताना हा शब्द सहसा भक्तीगीतांमध्ये किंवा काव्यात एखाद्या व्यक्तीच्या अत्यंत प्रसन्न आणि मंगल स्वरूपाचे वर्णन करण्यासाठी वापरला जातो. प्रत्येक व्यक्तीचे आनंदनिधान वेगळे असते.
आज मला हा शब्द वाचला किंवा ऐकला की आठवते, माझी आजी! आजोबा आम्ही पाहिलेच नाहीत. आणि लहानपणी पासून आजी जशी बघितली आहे. तशीच ती शेवट पर्यंत होती. तिच्या अनंत आठवणी, सल्ले, प्रेम सगळे आठवते. पण तीचे एक विशेष कायम आठवते ते म्हणजे तीने शोधलेला तिचा आनंद!
तिची सकाळ व्हायची ती श्रीकृष्णाच्या नावानेच! जणू तो कृष्ण तिच्या जवळच आहे. डोळे उघडताना म्हणणार, “चला कृष्णा, किती वेळ झोपायचे? उठा आता. ” उठल्यावर स्वतःचे मुखमार्जन झाले की लगेच त्या कृष्णाच्या मूर्तीच्या तोंडावर पाण्याचा हात फिरवणार. छोट्या रुमालाने पुसणार. चहा घेताना तो कप प्रथम कृष्ण मुर्ती समोर ठेवणार नंतर स्वतः घेणार. पुन्हा पाण्याचे बोट त्या मूर्तीच्या ओठांवर फिरवणार. प्रत्येक वेळी कृष्ण तिच्या बरोबर असल्या प्रमाणे त्याच्याशी बोलणार. अंघोळीला जाताना, “चला किती वेळ पारोसे रहायचे? स्नानाला चल कृष्णा ” म्हणणार. हे सर्व करताना तिच्यासाठी कृष्ण लहान मुला प्रमाणे असायचा. स्वयंपाक करताना, “चला कृष्णामाई आज हे बनवू या. चल भाजी निवडायला बरं ” असे म्हणणार. त्यावेळी कृष्ण तिच्यासाठी तिची सखी असायचा. जेवताना, काम करताना, वाचन करताना प्रत्येक वेळी कृष्णाला साद घालून आपल्या सोबत ठेवणार. जिथे एकटी जायची तिथे काहीही केले की लगेच कृष्णार्पण म्हणणार. आम्ही लहान असताना तिला चिडवत असू. “आजी कचरा टाकताना कृष्णार्पण म्हणू नको. नाहीतर तो कचरा कृष्णाच्या डोक्यावर येईल. ” पण ती रागवायची नाही. ती म्हणायची, “जगाची सफाई तर तोच करतो. मनाची, कचऱ्याची, बुद्धीची सफाई करुन चांगले विचार तोच तर देतो. तुम्ही एवढे खेळता, बोलता, इतकी हुशारी चांगली बुद्धी तोच तर देतो. “
तिला कुठे एकटी जाऊ नको असे कोणी म्हणाले, की तीचे उत्तर ठरलेले असायचे. “मी कुठे एकटी आहे, तो आहे ना माझा रक्षक सखा माझ्या बरोबर!” अगदी रात्री झोपताना सुद्धा त्या कृष्णाला साद घातल्या शिवाय झोपणार नाही. त्याला विविध दागिने घालणे, विविध कपडे घालणे, सण असेल तेव्हा जरीचे कपडे घालणे, थंडी पडली की, लोकरीचे कपडे घालणे, झोपतांना पांघरूण घालणे. हे सगळे चालू असायचे. लहानपणी याचा अर्थ कळायचा नाही. आणि गंमत वाटायची. पण जसे समजू लागले तसे तीचे वागणे, बोलणे पटू लागले. तीने विविध रूपातील कृष्णाला आपल्या आयुष्याचा रक्षणकर्ता, सोबती या रूपात बघितले होते. त्याची भक्ती केली होती. आपली सुखदुःखे त्याच्या बरोबर वाटली होती. तीचे आनंदनिधान तीने या कृष्णात शोधले होते.
विद्या वहिनी आणि माझा मामेभाऊ कौस्तुभ यांच्या मुलाचं तीन वर्षांपूर्वी लग्न झालं होतं, त्या लग्नाचा अल्बम बघत त्यांच्याशी निवांत गप्पा मारणं चाललं होतं. लग्न कसं जमलं, पत्रिका बघणं वगैरे विषय निघाले आणि मिश्किलपणे वहिनी म्हणाली, “लेकाच्या लग्नासाठी मुलींच्या पत्रिका येत होत्या, मग आम्ही आमच्या पुरोहितांकडून कामचलाऊरीत्या – प्राथमिक पत्रिका कशी बघायची, किती गुण जुळत आहेत ते कसं ठरवायचं हे सगळं शिकून घेतलं, आणि गंमत म्हणून आम्हा दोघांचे पत्रिकांनुसार किती गुण जुळतात ते पाहायचं ठरवलं. ”
— —
क्रिकेटमध्ये अंपायरने एखाद्या फलंदाजाला पायचीत (LBW) बाद ठरवलं, तर फलंदाजाला दाद (DRS) मागण्याचा हक्क असतो. जर अर्धवट चेंडूचाच यष्टीला (स्टंप) स्पर्श होत असेल, तर चेंडू यष्टीला नक्की लागत आहे का नाही, फलंदाज बाद आहे का नाही, हे अंपायरने दिलेल्या निर्णयानुसारच ठरते. जर अंपायरने फलंदाजाला बाद दिले असेल तर तोच निर्णय कायम ठेवला जातो, आणि जर नाबाद दिले असेल, तर तो निर्णय कायम ठेवला जातो.
– – – याला क्रिकेटच्या भाषेत “अंपायर्स कॉल” असं म्हणतात.
— —
“आमच्या लग्नापूर्वीची गोष्ट आहे ही. कौस्तुभची मोठी बहीण – किशोरी – ज्या कंपनीत नोकरीला होती, त्याच कंपनीत मी दोन – तीन महिन्यांपूर्वी कामाला लागले होते. नंतर ती आजारपणामुळे सलग काही दिवस कामाला आली नाही, म्हणून मी आणि मैत्रीण तिला घरी भेटायला गेलो होतो. आणि तेव्हा कौस्तुभची माझी पहिली भेट झाली होती.
योगायोगाने, एक महिन्याभरातच बाबांच्या एका मित्राने आम्हाला त्याचं स्थळ सुचवलं. त्यांनीच परस्पर माझी पत्रिकाही कौस्तुभच्या आई वडिलांना पाठवून दिली. त्यांच्याकडून पत्रिका जुळत असल्याचा निरोप आला, आणि मग प्रत्यक्ष त्यांच्याकडे भेटायला जाण्याबद्दल बाबांचे मित्र आणि बाबा बोलत होते.
चर्चेत ऐकू येणारे कौस्तुभचे आडनाव आणि पत्ता ऐकून मी म्हटलंही, “मी गेले आहे या घरी. याला बघितलंही आहे बहुतेक. ” त्यावर काकांनी मी कदाचित त्याच्या धाकट्या भावाला पाहिले असेल असं म्हटलं, आणि एकदा प्रत्यक्ष भेटावं असा आग्रह धरला.
सरतेशेवटी आम्ही त्यांच्या घरी गेलो, रीतसर मुलगा / मुलगी बघण्याचा कार्यक्रम झाला, पसंदापसंदी झाली, मी ‘ हो ‘ म्हटलं आणि चि. सौ. कां. विद्या परांजपे सौ. विद्या कौस्तुभ जोशी झाली.
घरी सासू, सासरे, धाकटा दीर सगळेच होते. नणंद किशोरी – तिचं आधीच लग्न झालं होतं. मी कौस्तुभला अगदी ‘अहो कौस्तुभ’सुद्धा म्हणायचे. आमचा काही प्रेमविवाह नव्हता, त्यामुळे रुसवेफुगवे, एकमेकांचे काही निर्णय न पटणे, वादावादी हे सगळं झालंसुद्धा.
माझ्या काही गोष्टी त्याला पटत नसायच्या, त्याच्या काही सवयींबद्दल मला आक्षेप होता. पण ही सगळी चहाच्या कपातली वादळं असायची, थोडी खळखळ व्हायची, पण नंतर शांतही व्हायची.
कौस्तुभची नोकरी, माझीही नोकरी, सासूबाईंचं अपघाती निधन, माझं बाळंतपण, नोकरीवर जाताना लेकाला माहेरी आईकडे सोडायचं – येताना त्याला परत घेऊन यायचं, कौस्तुभची वर्क्स मॅनेजरपदाची नोकरी, नंतर स्वतंत्र व्यवसाय – भरपूर धावपळ असायची.
पुढे धाकट्या दीराचंही लग्न झालं होतं, ते दोघं त्याच्या नोकरीमुळे वेगळ्या शहरात राहू लागले. नंतर वयोमानापरत्वे सासऱ्यांचेही निधन झाले. इकडे लेक शिकत होता, मोठा होत होता, इंजिनियर झाला, MBA केलं आणि बघता बघता त्याच्या लग्नाचे वारे वाहू लागले.
आणि तेव्हा आम्ही आमच्या पुरोहितांकडून कामचलाऊरीत्या पत्रिका कशा बघायच्या हे शिकून घेतलं. गंमत म्हणून आम्हा दोघांच्या पत्रिकांचे किती गुण जुळतात हे पाहिलं, तर ३६ पैकी आमचे फक्त १८. ५ गुण जुळत होते. कमीत कमी १८ गुण तरी जुळणं गरजेचं असतं, म्हणजे आम्ही दोघं अगदीच काठावर पास झालो होतो.
… कोणत्या गुरुजींनी आमच्या पत्रिका पाहून, फक्त १८. ५ गुण जुळत असूनही आमच्या लग्नावर शिक्कामोर्तब केलं होतं, कोण जाणे!
मला खरंतर आश्चर्य वाटलं, लग्न ठरवण्यासाठी ३६ पैकी कमीत कमी २४ तरी गुण जुळावेत अशी अपेक्षा धरली जाते, आणि इथे तर अगदीच कमी गुण जुळले असूनही आम्ही इतकी वर्षं गुण्यागोविंदाने संसार करत होतो.
कौस्तुभचे आजारपण, त्याची बायपास सर्जरी, त्याचा व्यवसाय सुरू असताना मी केलेल्या अनेक adjustments जशा माझ्या नजरेसमोरून सरकल्या, तसेच माझा accident, हाताचं fracture, मनगटाचं fracture या काळात आणि नंतर रोजच, भाजी निवडण्यापासून, चिरण्यापासून – स्वयंपाकघरातील आणि घरातील अनेक लहानमोठ्या गोष्टींत कौस्तुभचं माझा शब्दशः उजवा हात होणं – याही गोष्टी मला प्रकर्षानं जाणवल्या.
… ज्या कोण्या गुरुजींनी आमच्या पत्रिका बघितल्या होत्या, तो “अंपायर्स कॉल” आमच्या बाबतीत २००% खरा ठरला होता, हेच खरं.
वहिनी बोलायची थांबली. आता आणखी काही बोलायची गरजच नव्हती.
☆ लावण्याचा गाभा – पं. शिवकुमार शर्मा ☆ श्री विश्वास देशपांडे ☆
(१३ जानेवारी – प्रख्यात संतूरवादक पं. शिवकुमार शर्मा यांची जयंती. त्यानिमित्ताने त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा वेध घेणारा आलेख)
कविवर्य बा भ बोरकरांच्या ‘ लावण्यरेखा ‘ या कवितेच्या सगळ्याच ओळी कवितेच्या नावाप्रमाणे लावण्यखाणी आहेत. पण पं शिवकुमार शर्मा आपल्यातून गेले आणि मला बोरकरांच्या या कवितेतल्या शेवटच्या दोन ओळी आठवल्या. बोरकर म्हणतात
देखणा देहान्त तो जो सागरी सूर्यास्तसा
अग्नीचा पेरून जातो रात्रगर्भी वारसा.
पंडितजी गेले. सुरांचा सूर्य मावळला. संतूरचे सूर निमाले. पण त्यांचं हे जाणं अस्ताचलाला जाणाऱ्या सूर्यासारखं देखणं होतं. पंडितजींचं संगीत जसं निर्मळ आणि सुंदर होतं तसंच त्यांचं व्यक्तिमत्वही. तो एक देखणा राजहंस होता. अंतर्बाह्य सौंदर्य काय असतं हे जाणून घ्यायचं असेल तर अशा व्यक्तींकडे पाहावं. ‘ अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी… ‘ असं म्हणतात ना! तेच आतलं सौंदर्य सुरातही प्रतिबिंबित होत होतं अन चेहऱ्यावरही. अशी माणसं म्हणजे ‘ सत्यम शिवम सुंदरम ‘ ची उपासक असतात. सौंदर्याची पूजक असतात.
संतूर हा फारसी शब्द. संतूर हे वाद्य सुरुवातीला फक्त काश्मीर पुरतंच सीमित होतं. सुफी पंथीयांच्या संगीताला, गायनाला संतूरची साथ असायची. तेवढ्यापुरतंच ते मर्यादित होतं. पण संतूरला काश्मीरच्या बाहेर काढून त्याला केवळ भारतातच नव्हे तर संपूर्ण जगात लोकप्रियता मिळवून देण्याचं श्रेय फक्त आणि फक्त शिवकुमारजींचं!
शिवकुमारजींच्या रक्तातच संगीत होतं. वडील बनारस घराण्याचे मोठे गायक आणि कलाकार. सुरुवातीला उत्कृष्ट तबला वाजवणारे पंडितजी नंतर संतूर वादनाकडे वळले ते कायमचेच! नुकत्याच सहा फेब्रुवारी २०२२ ला लता मंगेशकर गेल्या आणि सूर निमाले आणि आता परवा १० मे रोजी पं शिवकुमारजी गेले आणि संतूर अबोल झाली. मला गानसम्राज्ञी लता मंगेशकर आणि पं शिवकुमार शर्मा यांच्यात काही साम्यस्थळे आढळतात. ती अशी दीनानाथ मंगेशकर यांच्या निधनाच्या वेळी त्यांनी लतादीदींच्या हातात आपली चिजांची वही आणि तंबोरा सोपवला आणि एक फार मोठी जबाबदारी तिच्यावर सोपवली. तिने आपलं आयुष्य गायनकलेसाठीच समर्पित करावं असंच जणू ते सांगत होते. लतादीदींनी आपल्या पित्याने सोपवलेली ही जबाबदारी किती सुंदर पद्धतीने निभावली हे सगळं जग जाणतं. गाणं आणि लता मंगेशकर या जणू एकाच नाण्याच्या दोन बाजू झाल्या. लता नावाची ही सुरांची वेल गगनाला जाऊन पोहोचली आणि रसिक त्या सुरांच्या वर्षावात चिंब न्हाऊन निघाले.
पं शिवकुमार यांच्या वडिलांनीही त्यांच्या हातात संतूर हे वाद्य दिलं आणि हे वाद्य तू शिक, लोकप्रिय कर असंच जणू सांगितलं. पंडितजींनी वडिलांची आज्ञा शिरोधार्य मानून संतूरच्या तारांवरून हात फिरवायला सुरुवात केली आणि संतूरमधून शुद्ध, निर्मळ सुरांच्या लडींची बरसात होऊ लागली. रसिक त्यात चिंब भिजले.
लता दीदी सुमारे साडेसात दशकं गात होत्या आणि पंडितजींची संगीत कारकीर्दही जवळपास तेवढीच. दोघांनीही संगीत जगभर पोहोचवलं. दोघंही श्रेष्ठ कलाकार. एकाच्या गळ्यात जादू तर दुसऱ्याच्या हातात. सूर दीदींच्या गळ्यात सौंदर्य घेऊन बाहेर पडत तर शिवकुमारजींच्या संतूरमधून ते सौंदर्य घेऊन प्रकटत. सुरांचा वर्षाव रसिकांवर सारखाच व्हायचा. अंगावर प्राजक्ताचा सडा पडावा, सगळं वातावरण त्या सुरांच्या सुगंधांनी मोहरून जावं तशी जादू व्हायची. श्रोते मंत्रमुग्ध व्हायचे.
मी संगीताचा जाणकार नाही. शास्त्रीय संगीत तर मला अजिबात कळत नाही. पण जे मंत्रमुग्ध करतं, सगळं विसरून जायला लावतं ते संगीत उत्तम असं मला वाटतं. मग त्यासाठी संगीताचे जाणकार असण्याची आवश्यकता नाही. या सगळ्या महान कलाकारांच्या संगीतात ती जादू होती. ते ऐकताना मनुष्य देहभान विसरून जायचा. म्हणूनच संगीत हे आपल्याला परमेश्वराशी जोडतं. पं शिवकुमारजी म्हणायचे की संगीत केवळ करमणुकीसाठी नाही. ते आपल्या आत्म्याला परमात्म्याशी जोडतं. म्हणूनच त्याची साधना करत राहिलं पाहिजे. पं शिवकुमारजी यांची संतूरच्या सुरांवर हुकूमत होती पण शेवटपर्यंत ते स्वतःला साधकच समजत होते.
जो साधक समजून आराधना करत राहतो, त्यालाच कलेची देवता प्रसन्न होते. याशिवाय संगीतामध्ये सृजनशीलता अत्यंत महत्वाची असते. याच सृजनशीलतेचे नवनवीन प्रयोग आपल्या संतूर वादनातून ते करत राहिले. रसिकांना भरभरून देत राहिले.
काही कलाकारांनी एवढी प्रचंड साधना केली की ते कलाकार आणि ते वाजवीत असलेली वाद्यं यांच्याशी त्यांचं नाव जे निगडित झालं ते कायमचं. शहनाई म्हटलं की आपल्याला आठवतात ते बिस्मिल्लाखां, सतार म्हटली की आठवतात पं रविशंकर, तबला म्हटलं की उस्ताद झाकीर हुसेन, अल्लारखां, व्हायोलिनचं नाव काढताच प्रभाकर जोग आठवतात. या सगळ्या कलाकारांची आयुष्यभराची तपश्चर्या या वाद्यांशी निगडित आहे. अशीच संतूरची साधना पं शिवकुमार शर्मा यांनी अखेरपर्यंत केली.
संतूर आणि पं शिवकुमार शर्मा या एकाच नाण्याच्या दोन बाजू झाल्या. संतूर वादनासाठी त्यांना जगभर लौकिक मिळाला तरी त्यांचे पाय सदैव जमिनीवर होते. कमालीची विनम्रता, ऋजुता आणि साधेपणा हे त्यांचे गुण त्यांचा मोठेपणा आणखी खुलवत होते.
पंडितजींच्या जीवनातला एक प्रसंग आहे. एकदा दिल्लीला कॉलेजच्या विद्यार्थ्यांसमोर त्यांचा कार्यक्रम सुरु होता. पंडितजींचा जन्म जम्मू काश्मीरचा. त्यामुळे बऱ्याच वेळा ते आपल्या श्रोत्यांशी ‘ डोगरी ‘ भाषेतूनही संवाद साधत. शिवकुमारजी संतूर वाजवताना लाकडी छडीचा वापर करीत. तिथे उपस्थित असलेल्या एका जम्मू काश्मीरच्या विद्यार्थिनीने उत्सुकतेने त्यांना विचारलं की संतूरवर ठेवलेलं हे काय आहे? तेव्हा शिवकुमारजी डोगरी भाषेतच उत्तरले. ” ये अखरोट (अक्रोड) की लकडीसे बनायी जाती हैं और इसे कलम कहते हैं. ” हे सांगताना शिवकुमारजींच्या चेहऱ्यावर एक मिश्किल हसू होते. कारण विद्यार्थी आणि कलम (पेन) यांचा घनिष्ठ संबंध! तेव्हा कार्यक्रमाचे निवेदक चटकन म्हणाले, ” और पुरे विश्वमे यही एक कलमधारी हैं… ” आणि हे खरेच होते. संतूर म्हणजे पंडित शिवकुमार शर्मा हे समीकरण होते.
काश्मीरला धरेवरचा स्वर्ग म्हटलं जातं. निसर्गानं मुक्त हस्तानं काश्मीरवर सौंदर्याची उधळण केली आहे. तेच काश्मीरचं सौंदर्य लेऊन हा लावण्याचा गाभा प्रकटला. आपल्याकडे संतांनी विठ्ठलाला ‘ लावण्याचा गाभा ‘ म्हटलं आहे. पं शिवकुमार म्हणजे त्यांच्या भक्तांसाठी हाच लावण्याचा गाभा होते. पं शिवकुमारजी म्हणजे मला सौंदर्ययात्री वाटतात. रेशमी सोनेरी, अंजिरी रंगाचा कुर्ता. चेहऱ्यावर अनिर्बंध रुळणारे कुरळे केस आणि मनाचं सौंदर्य प्रतिबिंबित करणारा चेहरा. ते जेव्हा संतूर वाजवायचे तेव्हा सौंदर्याची जणू दोन रूपे प्रकट व्हायची. त्यांच्या सुरातलं सौंदर्य आणि स्वतः त्यांचं मूर्तिमंत सौंदर्य. ते आपल्या कलाविष्कारात मग्न असताना स्वतः तर देहभान हरपून जायचे पण पंचाईत व्हायची ती श्रोत्यांची. पंडितजींकडे पाहावं की त्यांच्या सुरांकडे लक्ष द्यावं यातच रसिकांचा गोंधळ व्हायचा. एकाच वेळी डोळे आणि कान तृप्त व्हायचे. पंडितजींची संगीत समाधी लागलेली असायची आणि रसिकांची श्रवणसमाधी! कुरूपता या माणसाला मंजूरच नव्हती! मग ती कुठलीही असो.
पं शिवकुमारजींवर बोलता बोलता मला आठवले रवींद्रनाथ टागोर. टागोरही अत्यंत देखणे व्यक्तिमत्व लाभलेले महान कलाकार, शिक्षणतज्ज्ञ, संगीतकार, नाटककार, लेखक सारे सारे गुण सामावलेले अष्टपैलू व्यक्तिमत्व. त्यांच्याही अंगात रेशमी सोनेरी, अंजिरी कुर्ता. तेही सौंदर्याचे उपासक आणि पूजक होते. असं सांगितलं जातं की टागोरांना ‘ गुरुदेव ‘ ही उपाधी प्रथम महात्मा गांधींनी दिली आणि गांधीजींना ‘ महात्मा ‘ ही उपाधी प्रथम टागोरांनी दिली. दोघेही एकमेकांचे चाहते होते.
एकदा महर्षी रजनीशांनी आपल्या व्याख्यानात गांधीजी आणि टागोरांच्या भेटीचा एक प्रसंग सांगितला होता. गांधीजी एकदा टागोरांकडे राहायला गेले होते. गांधीजी कुठेही असले तरी आपले संध्याकाळचे फिरणे कधीच चुकवीत नसत. ते फिरायला निघाले तेव्हा रवींद्रनाथ म्हणाले, ” चला, मीही येतो तुमच्याबरोबर. तेवढ्याच गप्पा होतील. ” रवींद्रनाथ आरशासमोर उभे राहून आपले केस विंचरू लागले. कपडे ठाकठीक करू लागले. इकडे गांधीजी त्यांची वाट पाहत कंटाळले होते. गांधीजी त्यांना म्हणाले, ” आता या वयात कशाला पाहिजे एवढा नट्टापट्टा? कोण तुमच्याकडे पाहणार आहे? “
तेव्हा रवींद्रनाथांनी दिलेले उत्तर अतिशय सुंदर आणि त्यांची सौंदर्यदृष्टी स्पष्ट करणारे आहे. ते म्हणाले, ” कोणी पाहणार आहे म्हणूनच आपण सुंदर राहायचे का? आपण सुंदर राहिलो तर आपल्या मनाला तर चांगले वाटतेच पण समोरच्या पाहणाऱ्या व्यक्तीलाही आनंद होतो. मी अस्वच्छ राहिलो, कुरूप राहिलो तर त्यामुळे समोरची व्यक्ती प्रसन्न होणार नाही. तिच्या मनाला दुःख होईल. माझ्या मते कुरूपता म्हणजे हिंसा आणि सुंदरता ही अहिंसा! आयुष्यभर अहिंसेचे पुजारी राहिलेल्या गांधीजींनी कुरूपता म्हणजे हिंसा आणि सौंदर्य म्हणजे अहिंसा अशी आगळीवेगळी हिंसा आणि अहिंसेची व्याख्या प्रथमच ऐकली असावी.
नुसतेच सत्याचे उपासक असण्यापेक्षा ‘ सत्यम शिवम सुंदरम ‘ चे उपासक असणे कधीही चांगले हेच जणू रवींद्रनाथांना त्यांना सांगायचे होते.
पं शिवकुमार शर्मा यांनीही आयुष्यभर ‘ सत्यम शिवम सुंदरम ‘ ची उपासना केली. ‘ शिव ‘ तर त्यांच्या नावात होतेच! शिव आणि हरी (हरिप्रसाद चौरासिया) एकत्र आले तेव्हा अतिशय सुंदर सुमधुर चित्रपट संगीत प्रकटले. अनेक चित्रपटातून हा ‘ सिलसिला ‘ शास्त्रीय संगीताचे रूप घेऊन रसिकांपुढे आला आणि रसिकांना तो प्रचंड आवडला. आणि शिवकुमारजींच्या संतूरबद्द्दल तर काय बोलावं! ज्याच्यातून शास्त्रीय संगीत निघणे शक्य नाही अशा संतूर या तंतुवाद्याला जागतिक स्तरावर त्यांनी शास्त्रीय संगीताचे अधिष्ठान प्राप्त करून दिले.
संतूर हे वाद्य ‘ सुफियाना मौसिकी ‘ म्हणजे सुफी पंथात ईश्वराची साधना करण्यासाठी वापरले जायचे. त्यालाच ‘ शततंत्र वीणा ‘ असेही मूळ नाव होते त्याला पंडितजींनी जगभर प्रतिष्ठा मिळवून दिली. संगीताच्या रक्तात असलेल्या ईश्वरी देणगीला त्यांनी अखंड साधनेची जोड दिली. म्हणूनच हे यश ते मिळवू शकले. आपल्या यशाबद्दल बोलताना ते जे म्हणतात ते सगळ्यांनीच लक्षात ठेवण्यासारखे आहे.
ते म्हणतात, ” *तुमच्या आयुष्यात सर्वाधिक महत्वाचे काय असेल, तर ते आहे अपयश. कारण त्यामुळेच तुमचा प्रवास यशाकडे सुरु होतो. * ” कोणतीही माणसे उगाचच मोठी होत नाही. अपयशाने निराश न होता, खचून न जाता आपली वाटचाल सुरु ठेवायची असते. आपले ध्येय कधीही दृष्टीआड होऊ द्यायचे नाही हेच पं शिवकुमारजी जणू आपल्याला सांगतात.
☆ # दिसते मजला सुखचित्र नवे… # ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर☆
… आता अशी हिरवाई फक्त चित्रातून पाहावी लागावी असे कपाळकरंटे आम्ही आहोत… आम्हीच कशाला आमच्या मागून येणाऱ्या कैक पिढ्या या निसर्गाच्या देखाव्याला मुकणार आहेत… वनश्रीने नटलेली वसुंधरा नवपरिणीत पुरंध्री सारखी हिरवा मखमली शालू नेसून बसलीय असेच वाटते… तिचं ते पावित्र्याचे तेज इतके आहे कि तिथून वाहणारा वारा सुद्धा अगदी काही क्षण तिच्या सान्निध्यात मंद मंद वाहतो… तिचा वस्त्राला आपल्या मुळे थरथर होऊ नये याची काळजी घेतोय… तिथल्या वातारणातला पसरलेला तो गंध आपल्या अंगाप्रत्यंगात सामावून घेत धुंदीत होउन जातो… आपण इथच थबकूया असं वाटत राहत त्याला… तिथून पायच निघत नाही त्याचा… पण इलाज नसतो.. वाहणं हा गुणधर्म त्याला विसरता येत नाही… प्रकाशाला धुक्याची शाल पांघरून पहुडावं वाटतं… झाडं लता वेली गवताची पाती, छोटी कोवळी तृणांकुराची पसरलेली हिरवी जाजमं जलाशयाच्या काठाला बसून हळूच गुदगुल्या करत बसतात… जलाशयातील आपल्याच प्रतिबिंबावर फिदा होतात… लहान मोठे पक्षी, प्राणी या वनश्रीच्या आधाराने आपलं जीवन सुखानं व्यतीत करत राहतात… इथं जीवो जीवस्य जीवनम चा मूलमंत्र विसरून जाऊन जगा आणि जगू द्या चा नारा जपला… आकाशीचा सूर्य आणि चंद्र तेही पडले प्रेमात वसुंधरेच्या… आपलीच प्रतिमा शांत जळी पाहताना भुलून गेले… कोणे एकेकाळी हा नजारा असा दिसत असे… स्वार्थसाधू माणसाची दृष्टी तिच्यावर पडली नव्हती… पण जेव्हा त्याला दुर्बुद्धी झाली तेव्हा पासून ओरबाडणे सुरू झाले… हिरवे जंगल लुप्त झाले आणि तिथं सिमेंटचे जंगल उभे केले…
प्रकाश, वारा, पाणी, अडले तटले… निसर्गाला संपवले आणि हळूहळू आपली वाटचाल अधोगतीकडे केली… मग हा निसर्गाचा चमत्कार मुकला म्हणून रुदन करु लागला… त्याच्या आठवणीतला कल्पनेचा कुंचल्याने चित्र काढून स्वतःची भलावण करत बसू लागला… आणि आम्ही फक्त अचंबित होऊन म्हणू लागू कि ये कौन चित्र कार है.. चित्र कार है..
☆ मला समजलेली संत तुकारामांची गाथा… भाग – ३ ☆ सुश्री अरुणा मुल्हेरकर ☆
तुकारामांचे मन प्रपंचात, संसारात मुळीच रमत नाही. पांडुरंगाच्या भेटीची त्यांना तळमळ लागून राहिली आहे, म्हणूनच ते एकसारखे म्हणतात,
भेटी लागी जीवा लागलीसे आस
पाही रात्रंदिस वाट तुझी
परमेश्वर प्राप्तीच्या वेडाने
कन्या सासुरासी जाये। मागे परतुनी पाहे।
तैसे झाले माझ्या जीवा ।केव्हा भेटसी केशवा।।
जीवना वेगळी मासोळी तैसा तुका तळमळी. ।
तुकारामांची अवस्था पाण्याबाहेर तडफडणाऱ्या मासोळी सारखी झाली आहे. पांडुरंगाची कृपादृष्टी मिळवण्यासाठी आता काय करावे हा एकच विचार त्यांच्या मनात रात्रंदिवस घोळत आहे.
ते पांडुरंगाला साद घालतात आणि म्हणतात,
तान्हेल्याची धनी फिटे गंगा नव्हे उणी।
माझे मनोरथसिद्धी पाव भावे कृपानिधी।।
तू तो उदारांचा राणा माझी अल्पशी ।
कृपादृष्टी पाहे तुका म्हणे होई साहे ।
एखाद्या तहानलेल्या माणसाने गंगेतले पाणी पिऊन त्याचे समाधान झाले, तरी गंगेचे पाणी काही कमी होत नाही. माणूस मात्र तृप्त होतो. त्याचप्रमाणे हे कृपेच्या सागरा माझ्या मनातल्या इच्छा, माझे सर्व मनोरथ तूच पूर्ण करू शकतोस.
तुम्ही माझ्याकडे कृपादृष्टीने पहावे एवढीच माझी अल्पशी इच्छा आहे. माझ्या साधनेत मला मदत करा.
भक्ती मार्ग हा परमेश्वरा प्रती जाण्याचा सर्वात सोपा मार्ग आहे. बहुतेक सर्व साधुसंत याच मार्गाने गेले आहेत, कारण या मार्गात कुठेही आड वळणे नाहीत. भक्ती मार्गाची ही वाट अगदी स्वच्छ आहे.
संत तुकारामही याच मार्गाने जात आहेत.
ते साधकांना सांगतात,
नव्हतो सावचित्त तेणे अंतरले हित।
पडिला नामाचा विसर वाढविला संसार।।
लटक्याचे पुरी गेलो वाहूनिया दूरी।
तुका म्हणे नाव आम्हा सापडला भाव।।
ते स्वतः विषयी सांगतात की हरी चिंतनाविषयी सावध नव्हतो, म्हणून विघ्ने आली. हरी नामाचा विसर पडला आणि संसार वाढवत बसलो. मायेच्या पुरात पुरता अडकलो. परंतु आता जागा झालो आहे. हरिभक्तीची नौका सापडली आहे.
तेव्हा आता काय उणे आम्हा विठोबाचे पायी
नाही ऐसे काही तेथे एक
तुका म्हणे मोक्ष विठोबाचे गावी
फुकाची लुटावी भांडारे ती
पांडुरंगाच्या गावाला मोक्षाची भांडारे भरलेली आहेत आणि भक्तांना ती अगदी मोफत आता लुटता येतात.
तुकाराम महाराज या मायामोहातून, प्रपंचातून मुक्त होऊन पांडुरंगाशी एकरूप होण्यासाठी पंढरीच्या पांडुरंगाच्या चरणावर माथा ठेवण्यासाठी आतुर झाले आहेत. अतिशय व्याकुळ झाले आहेत. ते म्हणतात, ” पांडुरंगा तू मला फक्त भेट दे”. त्यासाठी…
*नलगे हे तुझे ब्रह्मज्ञान। गोजिरे सगुण रूप पुरे।।
लागला उशिर।पतित पावन ।विसरूनी वचन। गेलास या।।*
जाळूनी संसार। बसला अंगणी ।तुझे नाही मनी ।मानसी हे।।
तुका म्हणे नको राग रागेजू विठ्ठला। उठी पावतात देई मला भेटी आता।।
या अभंगातूनही विठ्ठलाच्या भेटीची तुकाराम महाराजांना लागलेली तळमळच दिसून येते. या अभंगात वापरलेला रागेजू हा शब्द मला विशेष लक्षणीय वाटला. लहान मूल जसे लडिवाळपणे त्याच्या मातेकडे काही हट्ट करते, त्याचप्रमाणे तुकाराम महाराज या माऊलीला रागावू नकोस असे मोठ्या लडिवाळपणे सांगत आहेत.
संसारातून तुकाराम महाराजांना पूर्ण विरक्ती आलेली आहे. पंचेंद्रियांवर ताबा मिळवलेला आहे, आणि ते पांडुरंगाला म्हणतात,
संसार हा तीही केला पाठमोरा
नाही द्रव्यदारा जया चित्ती
शुभाशुभ नाही हर्षामर्श अंगी
जनार्दन जगी होऊनी ठेला
तुका म्हणे दिला देह एकसरे
जयासी दुसरे नाही मग
त्यांना आता मान मरातब काही नको. त्यात त्यांना थोडेही सुख वाटत नाही. गोड अन्न सुद्धा त्यांना विष समान वाटत आहे. कोणी त्यांची स्तुती केली तर त्यांचा जीव कासावीस होतो.
ते म्हणतात,
नको मृगजळा होऊ मज
तुका म्हणे आता करी माझे हित
काढावे जळत्या आगीतून.
हा संसार म्हणजे त्यांना जळती आग वाटत आहे.
तुकाराम महाराजांच्या प्रत्येक शब्दातून त्यांची विठ्ठल भक्तीची आणि विठ्ठलाच्या भेटीची तळमळ दिसून येते
वर्षभर निरनिराळे योग साधून, जसे निरनिराळे सण / उत्सव / वाढदिवस / जागतिक दिवस, वगैरे, याकरता आपली शुभेच्छांची देवाण घेवाण सुरु असते. त्या दिवशी बहुतेकांची सुट्टी असते, घरी पूजा असते / काही कार्यक्रम असतो, येणारे जाणारे असतात, गोड खाद्य पदार्थ असतात, आणि शुभेच्छांची जोड पण असते. आणि त्यामुळे सगळ्यांना तो एक दिवस खरंच छान जातो.
आता नवीन वर्षाच्या आपण जेव्हा शुभेच्छा देतो तेव्हा त्या ३६५ दिवसांकरता असतात. वर्ष सुरु होतांना पहिल्या दिवशी म्हणजे एक तारखेला सगळीकडेच शुभेच्छांची भरपूर देवाण घेवाण सुरु असते, त्यामुळे तो दिवस छान जातो. पण नंतर पुढचे ३६४ दिवस आनंदाचे जाण्याकरता शुभेच्छा देणाऱ्यांची किंवा घेणाऱ्यांची काहीच हालचाल नसते. नुसते एक दिवस हॅपी न्यू ईयर म्हणून पूर्ण वर्ष नक्कीच आनंदाचे जाणार नसते.
आता ह्या दिलेल्या आणि घेतलेल्या शुभेच्छा जर आपल्याला वर्षभराकरता फलद्रुप करायच्या असतील, म्हणजे हा आनंदाचा दिवा जर आपल्याला वर्षभर तेवत ठेवायचा असेल, तर आपल्याला त्यात कायम तेल टाकत रहायला पाहिजे, म्हणजे त्याकरता शुभेच्छा देणाऱ्यांनी आणि घेणाऱ्यांनी वर्षभर त्याकरता काहीतरी करत रहायला पाहिजे.
लगेच प्रश्न उभा राहतो – म्हणजे काय करायला पाहिजे?
आपण आधी बघू – भाग पहिला – शुभेच्छा देणाऱ्यांनी समोरची व्यक्ती वर्षभर आनंदी राहण्याकरता स्वतः काय करायला पाहिजे.
मी जेव्हा समोरच्याला वर्ष आनंदाचे जावो अशा शुभेच्छा देतो, तेव्हा माझा वर्षभर असा रोल असायला पाहिजे, कि, वर्षभर माझ्या प्रत्येक कृतीमधून, मी त्या व्यक्तीला आनंदच दिला पाहिजे. चांगले बोलून आनंद दिला पाहिजे. जरुरीच्या वेळेस मदतीचा हात पुढे करून आनंद दिला पाहिजे. कामासंबंधी विचारपूस करून आनंद दिला पाहिजे. घरच्यांची खुशाली विचारून आनंद दिला पाहिजे. नेहेमी संपर्क ठेवून आनंद दिला पाहिजे. असे वर्षभर करत राहणे, यालाच खऱ्या अर्थानी भरीव / ठोस शुभेच्छा देणे असे म्हणता येईल. हा बदल आपल्याला ह्या वर्षी नक्कीच करायचा आहे.
आता बघू भाग दुसरा म्हणजे – शुभेच्छा घेणाऱ्यांनी मिळालेल्या शुभेच्छा वर्षभर फलद्रूप ठेवण्याकरता म्हणजे स्वतः वर्षभर आनंदी राहण्याकरता स्वतः काय करायला पाहिजे.
१) आपल्यापैकी प्रत्येकाच्या सुखी आणि आनंदी जीवनाबद्दलच्या कल्पना वेगळ्या असणार, हे सरळ आहे. म्हणून सुखी आणि आनंदी जीवनाबद्दल आपल्या ज्या काही कल्पना असतील, वर्षभराकरता आपली काही उद्दीष्ट असतील, त्यांचं आपल्याला यावर्षी एक काल्पनिक चलचित्र तयार करायचं आहे, आणि रोज सकाळी उठल्यावर, आणि दिवसभरात वेळ मिळेल तेव्हा ते बघायचं आहे. झोपतांना पण ते बघायचं आहे. ह्यालाच स्वप्न रंगवणे आणि ते स्वप्न बघणे, असे पण म्हणता येईल. असे यावर्षी नियमित केल्याने आपले स्वप्न साकार होणार / आपण वर्षभर आनंदी राहणार हे निश्चित.
कारण, What you think, so you become & What you imagine, so it happens.
२) मला समोरच्यांकडून ठोस शुभेच्छा मिळाल्या, आता यांचे जर मला सुंदर रोपटे करायचे असेल, ते फुलवायचे असेल, तर मला पण योग्य ती मेहेनत करायला पाहिजे, त्याला नियमित पाणी घालायला पाहिजे / खतं घालायला पाहिजे. मी जर कायम निरुत्साही असलो, कायम निरनिराळे नकारात्मक विचार मनात घोळत बसलो, हे दुखतंय – ते दुखतंय, हेच उगाळत बसलो, तर बियांचे सुंदर रोपटे कसे होणार आणि ते कसे फुलणार? स्वतःला सकारात्मक करण्याकरता / ठोस करण्याकरता, हेल्दी बॉडी आणि हेल्दी माईन्ड, हीच प्रूव्हन व्दिसूत्री आहे.
ही व्दिसूत्री अस्तित्वात उतरवण्याकरता अतिशय सोपे / कुठलाही साईड इफेक्ट नसणारे / खर्च नसणारे, अध्यात्मिक गुरूंनी दिलेले प्रिस्क्रिप्शन हे असे आहे – —
# रोज स्वत:करता एक तास द्या, त्यामधे –
* ३० मिनिटे चालणे : मस्त बूट घाला, रंगीबेरंगी कपडे घाला. मोबाईल घरी ठेवा. फिरतांना ‘बिग नो’ टू घरगुती वाद / नकारात्मक चर्चा. रमतगमत चालणे – नो वे! स्विफ्ट चालायचे आहे, ताठ चालायचे आहे. सकाळी फिरणे जमत नसेल, तर संध्याकाळी जाता येते. चालतांना दोन्ही हातानी ज्ञान मुद्रा किंवा तत्सम मुद्रा केली तर उत्तमच.
* १० मिनिटे प्राणायाम : तुमचा यावरचा अभ्यास असेल, तर त्याप्रमाणे करा. नाहीतर -. ५ मिनिटे अनुलोम – विलोम करा आणि ५ मिनिटे दीर्घ श्वसन करा, ५ मिनिटे ओंकार जाप करा.
* १० मिनिटे ध्यान करा : विचारशून्य अवस्थेमधे बसणे
* १० मिनिटे व्यायाम : आपल्या शरीराच्या सर्व सांध्यांची हालचाल होईल असे अगदी सोपे व्यायाम आपल्याला करायचे आहेत. आपण शाळेमध्ये पीटी च्या तासाला करायचो, साधारण तसेच.
आठवड्यातून ५ दिवस केले तर चालेल का? वगैरे, असे कुठलेही ऑपशन्स याला नाहीत.
# कळते पण वळत नाही —
‘कळते पण वळत नाही’ या म्हणीतून, या वर्षी आपल्याला पूर्णपणे बाहेर पडायचे आहे. म्हणजे जे कळते, त्याला आता वळते करायचे आहे. तब्येत छान राहण्याकरता ‘जंक फुड खाऊ नका’ हे आपल्याला कळते पण वळत नाही. ‘अति तेलकट-तुपकट खाऊ नका’, ‘साखरेचा अतिरेक टाळा’, ‘सिगरेट, दारू प्रमाणात ठेवा’, हे पण आपल्याला कळत असतं, पण वळत नसतं.
ज्या ज्या गोष्टींकरता, आपण ही म्हण वापरतो, त्या सगळ्यांना या वर्षी वळते करायचे आहे.
ज्या गोष्टी आपल्या आयुष्यात घडतात, त्यांचा मनापासून स्वीकार करायचा. प्रत्येक परिस्थितीमध्ये समाधानी असणे, फार महत्वाचे असते. समाधानी माणूसच मनन करू शकतो आणि परिस्थिती बदलू शकतो. अप्रिय घटनांवर मनन केलं, तर समजू शकतं, की, आपलंच ‘असं – असं’ चुकलं होतं, किंवा आपण कुणाची तरी मदत घ्यायला पाहिजे होती. आणि चूक सुधारून पुन्हा घोडदौड सुरु करता येते. घडणाऱ्या सगळ्याच चांगल्या – वाईट घटनांचे शिल्पकार आपणच आहोत, ही समज महत्वाची आहे.
# संवाद —
घरामध्ये आई-वडील, मुलं-मुली, सासु-सासरे, नवरा-बायको यांच्यात खेळीमेळीचे वातावरण असेल, तर घर आनंदी राहतं आणि ओघानीच आपण पण आनंदी राहतो. आणि याकरता जरूर आहे संवादाची.
एकमेकांची विचारपूस करणे, काय हवे-नको ते विचारणे, इतरांच्या चांगल्या कामाचे नेहेमीच मनापासून कौतुक करणे – प्रशंसा करणे, या गोष्टींना या वर्षी महत्व द्यायचे आहे.
# कुणी काय करावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे —-
रोजच्या आपल्या प्रवासात अनेक गोष्टी आपल्या मनाविरुद्ध घडत असतात. अशावेळेस, ह्यानी असं कां केलं? त्यानी असं कां केलं? हा असं कां वागतो? वगैरे, काथ्या कूट करण्यात आपण आपली सगळी ऊर्जा वाया घालवतो आणि हातात काहीच येत नाही. ज्ञानी मंडळी सांगतात – कुणी काय करावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. प्रत्येक जण आपापल्या वरच्या संस्कारांप्रमाणे वागत असतो, आणि ते आपल्याला पटेलच असे नाही. मी काय करावं एवढाच सोपा विचार मला करायचा आहे आणि आनंदात राहायचे आहे.
# मन चंगा तो सब चंगा —
मानसिक स्वास्थ्य बिघडले, की सगळेच बिघडते, आणि सगळ्याच बाबतीत उतरती कळा सुरू होते. मग आपण ज्योतिषाला हात दाखवतो / पत्रिका दाखवतो. आपल्या पत्रिकेत कुठल्या घरात शनि आहे, कुठल्या घरात राहू – केतू आहेत, मंगळ कुठे आहे, आणि मग त्यांना प्रसन्न कसे करता येईल, यावर आपले तन / मन / धन आपण एकाग्र करतो. आणि आपली भरकटत भ्रमंती सुरु होते.
शांत डोक्यानी विचार केला, तर लक्षात येते, की आकाशातले शनि-मंगळ-राहू-केतू यांचा आपल्यावर प्रभाव जेमतेम १० टक्के असतो. ९० टक्के प्रभाव टाकणारे / मानसिक स्वास्थ्य बिघडवणारे किंवा घडवणारे, खरे शनि-मंगळ-राहू-केतू-बुध-गुरु-चंद्र-सूर्य हे आपल्याच घरात आणि आपल्याच अवति-भवती असतात. एकदा का आपल्या घरात / आपल्या मित्रमंडळीत / आपल्या सहकाऱ्यांमधे, कोण शनी आहे / कोण राहू – केतू आहे / कोण गुरु आहे, – – – -, हे आपल्याला समजले, या जवळच्या ग्रहांच्या आवडीनिवडी आपण समजून घेतल्या, त्यांच्या चाली आपण समजून घेतल्या, तर त्यांना खुश ठेवणारी आणि आपल्याला त्रास न होणारी, आपली चाल आपल्याला ठरवता येते आणि आपले आयुष्य खूप सोपे होते, मनाला ताणतणाव पण राहत नाहीत.
प्रत्येकाचा स्वभाव हा वेगळा असतो, हा निसर्गाचा नियमच आहे. प्रत्येक झाडाचा स्वभाव वेगळा असतो, प्रत्येक प्राण्याचा स्वभाव वेगळा असतो.
स्वभावाला औषध नक्कीच असते. पण ते फक्त स्वतःचा स्वभाव बदलण्याकरता – इतरांचा नाही.
# वर्तमानकाळात रहा —
आपण आपला ५० % वेळ भूतकाळातल्या कडू आठ्वणी उगाळण्यात घालवतो आणि ५० % वेळ भविष्याची काळजी करण्यात घालवतो. त्यामुळे ताणतणाव हेच आपले आयुष्य बनते. मन आणि शरीर यांना बरोबर ठेवणे, यालाच वर्तमानकाळात राहणे असे म्हणतात, यालाच योगसाधना म्हणतात, यालाच ध्यान म्हणतात. ताणतणाव मुक्ती करता हीच महाऔषधी आहे.
# जर – तर ला बाय बाय —-
बहुतेक जण आनंदी होण्याकरता कुठल्यातरी बंधनाशी जोडी बांधतात. जर नवऱ्यानी माझं कौतुक केलं तर मी आनंदी होईन, जर बायकोनी असं – असं केलं तर मी आनंदी होईन. अशी जर-तर ची आपण लाईन लावतो, आणि परिणाम काय होतो, ते आपण अनुभवतोच. यावर्षी जर-तर ला बाय बाय करायचे आहे. आणि करायचं काय आहे? तर, आपण सगळ्यांवर अनकंडिशनल प्रेम करायचं आहे आणि स्वतः अनकंडिशनल आनंदी राहायचं आहे. असं म्हणतात, की, जर आपलं शरीर प्रेमानी आणि आनंदानी शिगोशीग भरलेले असेल, तर कुठलेही इन्फेक्शन / कुठलाही आजार / कुठलीही व्याधी आपल्या शरीरात प्रवेश करूच शकत नाही, कारण कुठे जागाच शिल्लक नसते.
# कायम आनंदी चेहेरा —
कायम आनंदी चेहेरा – ही आरोग्याची गुरूकिल्ली आहे. रस्त्यावर हातगाडी घेऊन हिंडणारे भंगारवाले नेहेमीच हसतमुख असतात. चहाची टपरी चालवणारे / रस्यावर झाडलोट करणारे, कायम हसतमुख असतात. मग आपलाच चेहेरा एरंडेल तेल प्यायल्यासारखा का असतो?
आपण नकारात्मक व्यक्तींपासून दूर राहिलो आणि सकारात्मक-हसतमुख व्यक्तींना जवळ केले, तर हमखास हसतमुख राहता येते. आपल्या आवडीचे छंद, जसे वाद्य वाजवणे, गाणी म्हणणे, चित्रकला, वगैरे यामध्ये जर आपण रमलो तर आपल्या चेहेऱ्यावर हमखास आनंद फुलतो.
चला तर मग – यावेळेस शुभेच्छांची देवाण घेवाण करतांना देणाऱ्यांनी “ठोस” बनायचे आहे, आणि शुभेच्छा घेणाऱ्यांनी पण “ठोस” बनायचे आहे.
नवीन वर्षाकरिता माझ्याकडून तुम्हाला खूप खूप आणि “ठोस” हार्दिक शुभेच्छा!!!
शीर्षकाविषयी मतभिन्नता असू शकते तरीही विषय जिव्हाळ्याचा आणि घराघरातला आहे. आजच्या संडे डिशचं मूल्यमापन वैयक्तिक अनुभवावर करावे ही आगाऊ सूचना आणि विनंतीसुद्धा.
रविवारची सकाळ, सुट्टीचा दिवस असल्यानं घर निवांत होतं. ‘सौ’पेपरमधलं कोडं सोडवत होती तर ‘अहो’ मोबाइलमध्ये हरवलेले.
‘बघ. परत तेच. कितीही चांगलं वागलं तरी… पालथ्या घड्यावर पाणी”
“ओके. क्षणभर तुमचं म्हणणं मान्य करते. नवऱ्यांच्या निरागसपणाचं पटेल असं एकतरी उदाहरण देता येईल. ” पेपर बाजूला ठेवत सौ पुढे सरसावल्या. या अनपेक्षित पवित्र्यानं अहो काहीक्षण गोंधळले पण लगेच स्वतःला सावरत म्हणाले. “एक कशाला?? पन्नास उदाहरणं आहेत.”
“पन्नास नको. दोन-चार सांगितली तरी चालेल. ”
“ऐक तर मग”मोबाइल बाजूला ठेवत अहोंनी बोलायला सुरवात केली.
“आधी एक प्रॉमिस कर. माझं ऐकल्यावर वाद घालायचा नाही. चिडायचं नाही. ”
“घाबरता का? ”
“हा हा हा. विनाकारण वितंडवाद नको म्हणून”
“ठीकयं. हाच नियम तुम्हांलाही लागू. ”
“मान्य”
“बोला आता!! ”
“चहापासून सुरवात करू. ”
“आधी बोला मग चहा मिळेल. ”
“हेच ते. पूर्ण ऐकून तर घे. मी चहा करायला सांगत नाहीये”
“मग!! ”
“तुला असं वाटतं की मी नेहमी चहासाठी ऑर्डर देतो. ”
“मग त्यात खोटं काय? तुमचा टोनसुद्धा तसाच असतो. ”
“असं काही नाही. बायका सतत बोलत असतात. ते ऐकण्यासाठी ताजंतवानं वाटावं म्हणून नवरे चहाची फर्माईश करतात. ”
“होssssका? हे नवीनच ऐकतेय. अजून… ”सौ.
“घराबाहेर असलो की इतर सुंदर चेहऱ्यांकडे निरखून पाहिलं जातं. त्याला सुद्धा कारण आहे. ”
“अग्गो बाई!! काय ते!! ”बोलताना सौंनी दोन्ही हाताचे पंजे अहोंच्या समोर ओवाळले.
“त्या सगळ्यांच्या तुलनेत आपली बायकोच अजूनही सुंदरच दिसते याची खात्री करण्यासाठी हे पाहणं असतं. इतका निर्मळ विचार असताना बायकांना वाटतं की… ”
“ही तर निरागसपणाची अत्युच्च पातळी झाली. ”सौ उपरोधिकपणे म्हणाल्या.
“जेव्हा बनवलेल्या एखाद्या पदार्थाला नवऱ्याकडून नावं ठेवली जातात तेव्हा राग येतो पण त्यामागची खरी तळमळ लक्षात घेत नाही. तुमचं पाककौशल्य सुधारून अजून उत्तोमोत्तम खायला मिळावं. एवढाच हेतू असतो”
“खरंच बाई!! नवरे किती कित्ती भोळेसांब!! . ”
“तेच तर सांगतोय. आमचा चांगुलपणा कोणी लक्षातच घेत नाही. चुका मात्र लगेच आणि वारंवार दाखवता. ”
“अरेरे!! ”
“म्हण की बिच्चारे!! ”
“अजिबात नाही. ”
“बायकांची अजून एक तक्रार म्हणजे आमचं घोरणं पण त्यामागचं गुपित सांगतो. आपण एकदम सुरक्षित आहोत. काळजी घ्यायला बायको खंबीर आहे. या भावनेनं नवरे निर्धास्त झोपतात. म्हणून मग… ”अहोंच्या बोलण्यावर सौंकडून काहीच प्रतिक्रिया आली नाही.
“काय झालं”
“तुम्ही बोला. ऐकतेय”
“तुमच्यामुळे सुंदर झालेलं आयुष्य रोज साजरं करत असल्यानं आणि कामाच्या गडबडीमुळे नवरे वाढदिवस विसरतात. तुमचं आयुष्यात येणं यापेक्षा मोठं गिफ्ट या जगात नाही असं आम्ही मानतो. ”अहो बोलायचं थांबले तेव्हा सौं टाळ्या वाजवत म्हणाल्या. “झालं की अजून आहे”
“अजून बरंच काही आहे पण तूर्तास एवढंच पुरे!! आता पटलं ना की नवरे निरागस असतात. ”
“शंभर टक्के चूक. ही अशीच उदाहरणचं असतील तर माझ्याकडे भरपूर स्टॉक आहे. हे मान्य करावचं लागेल. संसारासाठी माहेर, आपली माणसं सोडून आलेल्या बायका केव्हाही ग्रेटच!! . ”
“वाद नको. म्हणून मी हो म्हणतो”
“म्हणावचं लागेल तीच तर खरी परिस्थितीये. कुटुंबासाठी तडजोडी करत सहन करतो. म्हणूनच फक्त बोलून मन मोकळं करतो आणि तुम्ही म्हणता की बायका अति बोलतात. सासरं त्यातही नवऱ्यांना सांभाळणं सोपं नाहीये. खूप त्रास होतो. पार डोकं आऊट होतं. अनेकदा वाटतं की.. ”बोलताना सौच्या चेहऱ्यावरचे भाव आक्रमक झाले अन मुठी आवळल्या गेल्या. ते पाहून अहोंनी चाचरत विचारलं. “काय वाटतं? ”
“जाऊ दे. बोल्ले तर भांडणं होतील. या चर्चेचं तात्पर्य हेच की नवरे नाही तर आम्ही बायकाच बिचाऱ्या असतो नुसत्या नाही तर डब्बल बिच्चाऱ्या!! . सौंच्या आवेशानं अहोना जोराचा ठसका लागला. सपशेल माघार घेत भाजी आणायचं निमित्त काढून लगेच घरातून काढता पाय घेतला तेव्हा सौ मनापासून हसल्या.
☆ ।। श्री नारद उवाच ।। – नारद भक्ति सूत्रे — सूत्र ३६ ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले☆
।। श्री नारद उवाच ।।
नारद भक्ती सूत्र क्र. ३६
अव्यावृत भजनात् ॥ ३६ ॥
अर्थ :(ते भक्तिसाधन) अव्यावृत्त – अखंड भजनाने (सिद्ध होते.)
विवरण : मागील सूत्रात विषयत्याग व संगत्याग हे साधन सांगितले. आता या सूत्रात ती भक्ती सिद्ध होण्याचे ‘अव्यावृत भजन’ हे साधन सांगतात. भजन हे प्रसिद्ध साधन आहे. सर्वच भाविक कोणत्या ना कोणत्या प्रकारे भजन करीतच असतात. पण ते भजन अनन्यभक्ती निर्माण करीलच असे नाही.
भजन हे भक्तीचे महत्त्वाचे अंग आहे पण ते अव्यावृत-अखंड-झाले पाहिजे. भजनात खंड पडण्याची देहभोगप्रवृत्ती, विषयवासना, विकाराधीनता, अश्रद्धा इत्यादी अनेक कारणे असतात, ती दूर करून पूर्ण भावनेने ते भजन झाले पाहिजे.
आपल्याकडे खास करून भक्तिमार्गात अखंड अनुसंधानाचे महत्त्व सांगितले आहे. अखंडित नामस्मरण हा त्यातल्या त्यात सोपा मार्ग.
समर्थ आपल्या दासबोधाच्या चौथ्या दशकातील तिसऱ्या समासात याचे पुढील प्रमाणे वर्णन करतात.
*स्मरण देवाचें करावें । अखंड नाम जपत जावें । नामस्मरणें पावावें । समाधान ॥ २॥ नित्य नेम प्रातःकाळीं । माध्यानकाळीं सायंकाळीं । नामस्मरण सर्वकाळीं । करीत जावें ॥ ३॥ सुख दुःख उद्वेग चिंता । अथवा आनंदरूप असतां । नामस्मरणेंविण सर्वथा । राहोंच नये ॥ ४॥ हरुषकाळीं विषमकाळीं । पर्वकाळीं प्रस्तावकाळीं । विश्रांतिकाळीं निद्राकाळीं |नामस्मरण करावें ॥ ५॥ कोडें सांकडें संकट । नाना संसारखटपट । आवस्ता लागतां चटपट । नामस्मरण करावें ॥ ६॥ चालतां बोलतां धंदा करितां । खातां जेवितां सुखी होतां । नाना उपभोग भोगितां । नाम विसरों नये ॥ ७|| संपत्ती अथवा विपत्ती । जैसी पडेल काळगती । नामस्मरणाची स्थिती । सांडूंच नये ॥ ८॥ वैभव सामर्थ्य आणी सत्ता । नाना पदार्थ चालतां ।उत्कट भाग्यश्री भोगितां । नामस्मरण सांडूं नये ॥ ९॥ आधीं आवदसा मग दसा । अथवा दसेउपरी आवदसा । प्रसंग असो भलतैसा । परंतु नाम सोडूं नये ॥ १०॥”*
*इथे भजन याचा व्यापक अर्थ अभिप्रेत असावा. टाळ, मृदुंग घेऊन २४ तास कीर्तन करणे इतका प्राथमिक अर्थ इथे नक्कीच नसावा. अंतर्मनात सतत सद्गुरूंनी दिलेल्या नामाचे स्मरण होणे, आणि त्याची एक धून, एक नाद सतत मनात गुंजत रहाणे, बाहेरून कर्म करीत असताना जसा मनुष्य श्वासोश्वास करीतच असतो, त्याप्रमाणे हा नामाचा नाद गुंजत रहाणे म्हणजे अखंड भजन. *
अशा अखंड भजनानेच खरी प्रेमभक्ती उत्पन्न होते. ध्रुव-प्रल्हादादिकानी अव्यावृत भजनच केले. ‘भजनं-भक्ति. ‘ भजन म्हणजेच भक्ती असा भजन शब्दाचा अर्थ आहे. पण ‘तुका म्हणे नाम । मागे मागे धावे प्रेम ।’ असे श्रीतुकाराममहाराज म्हणतात. अंतःकरणात गुणकामनारहित परमप्रेम एकदम सहजासहजी उत्पन्न होणे कठीण आहे. ती भक्ती या अखंड भजनाने उत्पन्न होते ‘आई आई’ या नावाने हाका मारतामारताच बालकाच्या ठिकाणी मातृप्रेम वृद्धिंगत होत असते.
श्रीकृष्ण म्हणतात, हे पार्था, जे भक्त विषयांना तिलांजली देऊन म्हणजे विषयांवर पाणी सोडून, सवासना विषयत्याग करून, यावत् प्रवृत्ती म्हणजे व्यवहाराचा निरोध करून मला अंतःकरणात साठवून माझ्या स्वरूपाचा भोग घेतात, त्यांचे माझ्या स्वरूपाचा कितीही भोग घेतला तरी समाधान होत नाही, ‘ जास्त काय, ‘भूक, तहान याचा त्यांना पत्ता नसतो. तेथे डोळे इत्यादी इंद्रियाकडे कोण पाहील? ‘ असा वरील ओव्याचा आशय आहे. व्यावृत म्हणजे तेथून परतणे. भजन करता करता कोणत्याही अन्य कारणाने भजनापासून परत न फिरणे.
श्रीभानुदासमहाराज सांगतात –
*”जैं आकाश वर पडों पाहे । ब्रह्मागोळ भंगा जाये । वडवानळ त्रिभुवन खाये । तरी तुझीच वाट पाहें गा विठोबा ॥०१॥ न करी आणिकांचा पांगिला । नामधारक तुझाचि अंकिला ॥०२॥ सप्त सागर एकवट होती । जैं हे विरुनी जाय क्षिती । पंचमहाभुतें प्रलय पावती । परि मी तुझाचि सांगातीं गा विठोबा ॥०३॥ भलतैसें वरपडों भारी । नाम न संडों टळों निर्धारी । जैसी पतिव्रता प्राणेश्वरी । विनवी भानुदास म्हणे अवधारी गा विठोबा ॥०४॥”*
(अभंग क्रमांक ५७)
अशी असिधारा भक्ति करता आली तर भगवंत दूर नाही. माउली आपल्या हरिपाठात सांगतात,