मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “युद्धाय कृतनिश्चय:!” ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

☆ “युद्धाय कृतनिश्चय:!” ☆ श्री संभाजी बबन गायके

डिसेंबर, १९७१. कितीतरी महिन्यांपासून होणार होणार म्हणून गाजत असलेल्या भारत-पाक युद्धाचा बिगुल फुंकला गेला.

१९६८ मध्ये सैन्यात दाखल झाल्यावर त्यांना रेजिमेंट मिळाली ती दी डेक्कन हॉर्स. त्यांच्या मागच्या दोन तीन पिढ्या याच रेजिमेंटमधून लढल्या होत्या. ही रेजिमेंट यावेळीही युद्धक्षेत्राच्या अगदी समीप तैनात होती. नव्याने दाखल झालेले अधिका-यांचे बाहू तर फुरफुरत होते… युद्धात शौर्य गाजवायला मिळणार याचा आनंद होता! पण या तरुण लष्करी अधिका-याच्या या आनंदावर काहीसे विरजण पडले, असे म्हणावे लागेल.

नोव्हेंबर महिना होता. यांना महाराष्ट्रातल्या अहिल्यानगर (आधीचे अहमदनगर) येथे स्थापन होणार असलेल्या लष्करी केंद्राच्या कर्तव्यावर धाडण्यात आले. मेजर आर. डी. लॉ साहेब प्रमुख होते. त्यांच्या सोबत कॅप्टन ए. के. भाटिया साहेब सेकंड-इन-कमांड होते. आपल्या कथानायकास इथे लेफ्टनंट म्हणून जबाबदारी देण्यात आली. काही दिवसांच्या रणगाडा विशेष प्रशिक्षणानंतर १३ नोव्हेंबर, १९७१ रोजी राजस्थान सीमेवर जाण्याचे आदेश मिळताच आपले नायक अत्यंत आनंदित झाले! जंगी निरोप समारंभ झाला… चार्ज ऑफ द लाईट ब्रिगेड हे लष्करी गीत वाजवण्यात येत होतं… त्यामुळे वातावरण एकदम रोमांचक बनले होते… आता युद्धावर जायला मिळणार याचा आनंद होताच… पण निरोप देण्यासाठी घरचे कुणी नव्हतं याचं काहीसं वैषम्य होतंच! मात्र दुसरे एक युवा अधिकारी किशोर बडबडे साहेब यांचे कुटुंबीय खास पुण्यावरून अहमदनगरला आले होते.. त्यांना निरोप द्यायला… जी त्यांची दुर्दैवाने शेवटची भेट ठरणार होती! पाचव्या दिवशी हे रणगाडा सैन्य जोधपूर-पोखरण येथे पोहोचले आणि त्यांना जैसलमेर येथे लोंगेवाला येथे युद्धात सहभागी होण्यासाठी पाठवले जायचे ठरले होते. तोवर युद्ध-सराव जोरात केला जात होता… रणगाडे तयार केले जात होते… आता फक्त आदेशाची प्रतीक्षा होती.

पण आपल्या कथानायकाच्या या युद्ध निश्चयात एक मोठीच समस्या आली… पोटाच्या विकाराने भयंकररीत्या डोके वर काढले. वैद्यकीय तपासणीअंती यांना जोधपूरच्या लष्करी रूग्णालयात भरती करावे लागले… अर्थात या शूर वीराची याला अजिबात तयारी नव्हती… पण वरिष्ठ अधिका-यांनी ठाम नकार दिला!

अगदी अनिच्छेनेच साहेबांनी हा आदेश स्वीकारला आणि उपचारांसाठी रुग्णालयात दाखल झाले… पण संपूर्ण लक्ष युद्धभूमीकडे लागून राहिलेले… आणि बातमी आली… पाकिस्तानी रणगाडे भारतीय हद्दीत घुसले आहेत! लोंगेवालाजवळ जोरदार धुमश्चक्री सुरु आहे… आपले लोक युद्धात आहेत आणि मी असा इथे रुग्णालयात… हे काही मनाला पटेना.. साहेबांनी मनाशी ठरवले… रूग्णालयातील सर्वांची नजर चुकवून रुग्णाचा गणवेश काढला… लष्करी गणवेश चढवला… आणि रुग्णालयातून पळ काढला… कुणालाही न सांगता! रुग्ण बेपत्ता झाल्याचे लक्षात येताच मोठा गहजब झाला… आणि संबंधित लष्करी अधिका-याने युद्धाच्या वातावरणात लष्कर सोडून पलायन केल्याचा समज झाला… तसा रिपोर्टही तयार झाला! हा मोठाच गुन्हा! ६ डिसेंबर, १९७१. साहेबांनी जोधपूर बाहेर पडणारा रस्ता धरला… एक तीन चाकी वाहन मिळाले… त्यात स्वारी स्वार झाली. पुढे बस आणि त्याहीपुढे जाऊन जैसलमेरकडे जाणारी रेल्वे धरली… त्यादिवशी दुपार झाली जैसलमेरमध्ये पोहोचायला. रेल्वे स्टेशनवर तैनात लष्करी अधिका-याने यांना एका आर्मी ट्रकमध्ये बसवून दिले… आणि ट्रक लोंगेवाला पोस्टवर पोहोचला. तिथे मोठा संघर्ष होऊन गेला होता. कितीतरी लष्करी वाहने, रणगाडे जळालेल्या अवस्थेत पडलेले होते. एक पाकिस्तानी रणगाडा अजूनही जळतच होता… हे साहेब त्या रणगाड्यापाशी उभे असताना त्यांना कॅप्टन अर्जुन सिंग साहेबांनी पाहिले. त्यांना आश्चर्य वाटले… त्यांना सारी हकीकत सांगितल्यावर त्यांनी विचारले… तुमची तुकडी कुठे आहे? त्यावर या साहेबांकडे काहीच उत्तर नव्हते. युद्धाच्या धामधुमीत काही संपर्कही साधणे अवघड होते. जी. एस. बावा साहेबांनी यांना जैसलमेर वाळ्वंटात असलेल्या एका पाणी भरण्याच्या ठिकाणापर्यंत जाणार असलेल्या ट्रकमध्ये कॅप्टन ए. एस. क्लेर साहेबांसोबत बसवून दिले.. या ट्रक मध्ये एक बंदी पाकिस्तानी सैनिक होता.. त्याला घेऊन ट्रक निघाला होता! सीमेवर अगदी पुढे तैनात असलेल्या १२, इन्फंट्री डिविजनच्या हेडक्वार्टर मध्ये साहेब पोहोचले… तेथे मेजर जनरल आर. के. खंबाटा साहेब, ब्रिगेडीअर ई. एन. रामदोस साहेब होते.. त्यांना या युद्धासाठी रूग्णालयातून पळून आलेल्या सैनिक अधिका-याचे कौतुक वाटले. त्यांनी पुढे जाणार असलेल्या गोरखा रायफल्ससोबत जाण्याची व्यवस्था लावून दिली… पाकिस्तानचा आपण पकडलेला एक रणगाडा चालवत नेण्याची संधी मिळाली! ठरलेल्या जागी पोहोचल्यावर गोरखा रायफल्सच्या वरिष्ठ अधिका-यांनी या साहेबासोबत दोन जवान दिले आणि यांची स्क्वाड्रन शोधायला पाठवले. संध्याकाळ झाली होती… हे तिघे एका गन पोझिशनपर्यंत पोहोचताच तेथील सजग पहारेका-याने यांना अटक केली… पण ओळख पटवणारी कागदपत्रे होती म्हणून बचावले! तिथे कर्तव्यावर असलेल्या कॅप्टन एच. सी. हुडा साहेबांनी यांना ओळखले… त्यांचा यांच्या कुटुंबाशी परिचय होता! रात्री मुक्काम आणि सकाळी नास्ता झाल्यावर यांना पुढे जाण्याची परवानगी दिली… सकाळी काही वेळातच या साहेबांना त्यांच्या स्क्वाड्रनची पाच वाहने दिसली… अत्यानंद झाला! चुकलेलं वासरू कळपात परतलं होतं जणू. साहेबांनी एका रणगाड्याचा ताबा घेतला… आणि पुढे निघाले… आणि त्यांच्या ताफ्यावर पाकिस्तानी विमानांनी हल्ला चढवला… हा हल्ला परतवून लावण्यात आला! मेजर लॉ साहेबांनी वायरलेसवर मेसेज केलेला असताना त्यांना या साहेबांनी ‘रेडी’ असे उत्तर दिले… यांचा आवाज ऐकून तर साहेबांना धक्काच बसला… हा तर रुग्णालयात भरती होता… इथं कसा पोहोचला… साहेब म्हणाले एवढा हल्ला झाल्यावर मला भेट! तो हल्ला व्यवस्थित झाला… कारवाई उत्तम झाली! साहेबांसमोर हे साहेब उभे राहिले… साहेबांनी सर्व हकीकत जाणून घेतली… मिलिटरी हॉस्पिटलशी संपर्क साधला… आणि लेफ्टनंट वेद प्रकाश दहिया यांच्याविरोधात ‘लष्करातून पलायन’ केल्याचा आरोप मागे घेतला जाईल, अशी व्यवस्था केली… रूग्णालयातून डिस्चार्ज दिला गेल्याचे प्रमाणपत्र तयार करायला लावले… सांगितले… रुग्ण बरा होऊन लढाईमध्ये आलाय!

दहिया साहेबांनी पुढे कित्येक दिवस झालेल्या सर्व मोहिमांमध्ये पुढे राहून हिरीरीने भाग घेतला… रणगाडे घेऊन अगदी पाकिस्तानी भागांत खोलवर तब्बल ५४ किलोमीटर्सपर्यंत मुसंडी मारली. दरम्यान कुमाऊ बटालियनमध्ये कर्तव्यावर असलेल्या सख्ख्या भावाची कॅप्टन वाय. ई. एस. दहिया यांची भेट झाली… पुढे दोघा भावांनी मिळून पाकिस्तानी सैन्यावर हल्ल्याच्या मोहिमेत एकत्रित भाग घेतला… कॅप्टन वाय. ई. एस. दहिया साहेबांना मेन्शन-इन-डिसपॅच ने गौरवण्यात आले.

जोधपूर येथील रुग्णालयातून पळ काढीत थेट युद्धभूमीवर पोहोचून भारत मातेच्या रक्षणार्थ प्राण पणाला लावणा-या दहिया साहेबांची कहाणी अतिशय रोमांचक आणि स्फूर्तीदायक आहे… या अशा बहादूर सैनिकांमुळेच देश सुरक्षित हातांत आहे.

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ अर्जंट पाहिजेत… लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

श्री सुनीत मुळे

? वाचताना वेचलेले ?

☆ अर्जंट पाहिजेत… लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे 

अर्जंट पाहिजेत

– – –  इच्छुक व्यक्तींनी संपर्क साधावा

 

एक शिंपी पाहिजे,

जो एकमेकांची तुटलेली नाती शिवु शकेल

एक इलेक्ट्रिशियन पाहिजे,

जो एकमेकांशी न बोलणाऱ्या दोन व्यक्तीमध्ये

पुन्हा एकदा कनेक्शन जोडून देईल,

एक ऑप्टिशियन पाहिजे,

जो लोकांची दृष्टी आणि

दृष्टीकोन नीट करून देईल,

एक कलाकार पाहिजे,

जो प्रत्येकाच्या चेहऱ्यावर स्मित

हास्याच्या रेषा रेखाटू शकेल,

एक बांधकाम कामगार पाहिजे,

जो दोन शेजाऱ्यांमध्ये

उत्तम सेतू उभारू शकेल,

एक माळी काका पाहजे,

जो चांगल्या विचारांच

रोपण करू शकेल,

एक प्लंबर पाहिजे,

जो तुंबलेल्या मनांना

मोकळं करू शकेल,

एक शास्त्रज्ञ पाहिजे,

जो एकमेकांबद्दलची

ओढ शोधू शकेल,

आणि सर्वात महत्वाचे म्हणजे,

एक शिक्षक पाहिजे,

जो एकमेकांशी संवाद कसा

साधायचा ते शिकवू शकेल,

आज तुम्हा-आम्हा, सर्वांना

याचीच नितांत गरज आहे..!!

संपर्क :- माणसाने माणसाशी करावा.

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती – श्री सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ तो आणि मी…! – भाग ८७ ☆ श्री अरविंद लिमये ☆

श्री अरविंद लिमये

? विविधा ?

☆ तो आणि मी…! – भाग ८७ ☆ श्री अरविंद लिमये ☆

(पूर्वसूत्र- नाईकसरांचं फक्त एक दोन दिवसांच्या सवडीने पुण्यात येणं, त्यांना त्यावेळी माझी नेमकी आठवण होणं, त्यांनी मला आवर्जून फोन करणं, त्यांच्या लेक, जावयाच्या घरी आमची भेट होणं, त्या दोघांनी नेमकी अलिकडेच त्यांची नवीन प्रकाशन संस्था सुरु केलेली असणं, सरांचा माझ्यावर अतिशय लोभ असल्यामुळे त्यांना माझा नवीन कथासंग्रह या त्यांच्या घरच्याच प्रकाशन संस्थेतर्फे प्रकाशित व्हावा असं वाटणं, यासारख्या फार फार तर महिन्याभरातच घडून गेलेल्या अचंबित करणाऱ्या घटनांच्या रूपातल्या ‘त्या’च्या कृपालोभाच्या असंख्य धाग्यादोऱ्यांनी घातली गेलेली घट्ट वीण अखेर माझ्या उर्वरित आयुष्याला एक अनोखी कलाटणी देऊन जाणार आहे हे मात्र माझ्या गावीही नव्हतं! …)

पण त्याची प्रचिती देणाऱ्या अशा कांही घटना नंतर घडत गेल्या कीं मनात हे सगळं खरंच सत्य कीं स्वप्न असा संभ्रम निर्माण व्हावा!

माझ्या बँकेचे रोजचे रुटीन आणि न संपणाऱ्या कामांच्या व्यापात एक प्रूफ रिडिंग (तेही मी माझ्या समाधानासाठीच केलेले..) वगळता माझा कथासंग्रह आकाराला येण्याच्या प्रोसेसमधे मी इच्छा असूनही माझा प्रत्यक्ष सहभाग फारसा देऊच शकलो नव्हतो. मुखपृष्ठ, चांगल्या मुद्रकाचा शोध, मुद्रितांच्या कॉपीज् काळजीपूर्वक तपासणे, प्रकाशन समारंभाचे नियोजन, त्यासाठी आमंत्रितांच्या येण्या-जाण्याच्या सोयीचा विचार करून पुण्यात मध्यवर्ती भागातला हॉल शोधणे, प्रमुख पाहुण्यांची निवड, त्यांच्याशी चर्चा, त्यांना आमंत्रण, त्यांच्या वयाचा विचार करून त्यांच्या प्रवासाची, वास्तव्याची, स्वास्थ्याची विशेष काळजी घेणे, या सगळ्याबरोबरच कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिका छपाईच्या व्यवस्थेपर्यंतच्या सगळ्याच आघाड्या वेळोवेळी अतिशय व्यवस्थित सांभाळत होते ते स्वतः राजू आणि नितीन हेच दोघे!

मी पुण्यात फॅमिली शिफ्ट केलेली नसली तरी टिळक रोडवरील ‘अपूर्वा अपार्टमेंट’ मधे वन रूम किचनचा एक फ्लॅट भाड्याने घेतलेला होता. स्वैपाक न् भांड्याला बाई यायच्या. त्यामुळे शाळा/काॅलेजना सुट्ट्या असतील तेव्हा आरती/सलिल येऊ शकतील आणि बदल म्हणून आईही इथे येऊन सलग कांही दिवस राहू शकेल हा त्यामागे उद्देश होता. या कथासंग्रहाचं नियोजन सुरू झालं त्याच दरम्यान योगायोगाने आई इथे आलेलीच होती. प्रकाशन समारंभाचं नियोजन सुरू झालं त्याच दरम्यान माझ्या सासूसासऱ्यांचंही पुण्यात येणं होणार होतं. माझी मोठी बहिण-मेव्हणेही आवर्जून येणार होते. मोठा भाऊ तर पुण्यातच होता. या खेरीज अगदी जवळचे असे इतर बरेच नातेवाईकही पुण्यातच होते. ते सर्वजणही येणार होते. एरवी आवर्जून ठरवायचं म्हटलं तरी सर्वांना एकत्रित आणणारा अशा कौटुंबिक सोहळ्याचा योग सहजासहजी येणं शक्यच नव्हतं. आणि हे सगळं आता शक्य होणार होतं ते असं अगदी अचानक ठरलेलं असूनही अल्पकाळातच आकाराला येऊ लागलेल्या माझ्या ‘स्पर्श प्रकाशाचा’ या कथासंग्रहाच्या प्रकाशनाचा योग आला होता म्हणूनच!

या सगळ्या घटनांना निमित्त झाल्या त्या नाईकसरांच्या मनातल्या माझ्याबद्दलच्या सद्भावना आणि त्यामुळेच त्यांचा मला आलेला त्या दिवशीचा ‘तो’ अनपेक्षित फोन!

खरंतर आत्तापर्यंतच्या योगायोगानेच घडाव्यात तशा घडत गेलेल्या या घटनाही त्यामधे लपलेल्या ‘त्या’च्या कृपालोभाची जाणीव करून द्यायला पुरेशा होत्या माझ्यासाठी. पण याही पेक्षा आश्चर्यकारक आणि तितक्याच सुखद योगायोगाचे धागेदोरेही याच सगळ्या घडामोडींशी घट्ट जुळणार होते ज्यामुळे माझ्या उर्वरित आयुष्याला तोवर मी कधी कल्पनाही केली नव्हती असं अनोखं वळणही मिळणार होतं!!

ते सगळं आज आठवतानाही स्वप्नवतच वाटत रहातं!

याच संदर्भात त्या कार्यक्रमाची रूपरेषा ठरवण्यासाठी आम्ही बसलो होतो तेव्हा नितीन म्हणाला,

” ‘स्पर्श प्रकाशाचा’ शं. ना. नवरे यांच्या हस्ते प्रकाशित व्हावं असं मला वाटतं. “

शं. ना. नवरे माझेही आवडते लेखक होतेच. पण तरीही या छोट्याशा कामासाठी ते डोंबिवलीहून पुण्यापर्यंत यायला तयार होतील का? हा प्रश्न होताच. पण नितीनने त्यांना फोन केल्यावर प्रकाशन समारंभ कधी आहे हे विचारून घेऊन, ते कसलेही आढेवेढे न घेता ‘हो’ म्हणाले, हा एक शुभशकूनच आहे असंच मला वाटलं. राजू, नितीन आणि मी तिघेही कार्यक्रम व्यवस्था, निमंत्रितांचं स्वागत, या सगळ्या देखभालीत व्यस्त असताना शं. नां. ची लोकप्रियता आणि त्यांचं वय लक्षात घेता त्यांना पुणे स्टेशनवर रिसीव्ह करण्यापासून परतीच्या प्रवासात निरोप देईपर्यंत त्यांच्या सोबत राहू शकणारी दुसरी एखादी जबाबदार व्यक्ती आवश्यक होती. पण सहज उपलब्ध होणारं त्यावेळी कुणीच नजरेसमोर येईना. अखेर नितीननेच शन्नांना कार्यक्रमाच्या दिवशी रविवारी सकाळी पुणे स्टेशनवर रिसिव्ह करण्यापासूनची सगळी जबाबदारी स्वत:कडे घेतली आणि प्रकाशक म्हणून राजू आणि लेखक म्हणून मी अशा आम्हा दोघांना त्याने प्रकाशन समारंभाच्या हॉलवरची सर्व व्यवस्था पहाण्यासाठी पूर्ण वेळ उपलब्ध करून दिला.

प्रकाशन समारंभ टिळक रोडवरच्या ‘टिळक स्मारक मंदिर’ मधील हाॅलमधे करायचं ठरलं तो रविवार होता.

अर्थात त्या आधीचे शुक्रवार आणि शनिवार अशा दोन दिवसांच्या रजेचं नियोजनही मी आधीपासूनच करून ठेवलं होतं. पण… ऐनवेळी अचानक अशी विचित्र परिस्थिती उद्भवली कीं त्या दोन्ही दिवसांची रजा रद्द करून मला पूर्णवेळ आॅफिस अॅटेंड करणं अपरिहार्यच होऊन बसलं!

याला निमित्त झालं ते सेंट्रल आॅफिसमधून अचानक आलेला एक महत्वाचा फॅक्स आणि पाठोपाठ आलेल्या त्याला पुष्टी देणाऱ्या फोनचं! आमच्या जी. एम्. मॅडम नेमक्या शुक्रवारीच झोनल आॅफिस व्हिजीटसाठी येणार होत्या. आणि शनिवारी इथल्या लोकल ब्रॅंचेसपैकी दोन ब्रॅंचेस् ना भेट देऊन त्या पुढे कोल्हापूर रिजनल आॅफिसला मिटिंगसाठी जाणार होत्या! त्यामुळे आमच्या आॅफिसमधे महत्वाच्या बाबींबद्दल धोरणात्मक चर्चा, दुपारी उशीरपर्यंत सुरू राहू शकणारी लंच मिटींग आणि शनिवारच्या लोकल ब्रॅंच व्हिजीटची व्यवस्था यासाठी आम्हा सर्वांची उपस्थिती आणि सहभाग अपरिहार्यच होता हे ओघानं आलंच!

या सर्व अनिश्चिततेला सामोरं जाताना मी खूप अस्वस्थ होतो. हातातोंडाशी आलेलं खूप कांही हातून निसटून जात असल्याच्या भावनेने ती अस्वस्थता अधिकच वाढत गेली. हाकेच्या अंतरावर आलेल्या प्रकाशन समारंभाचा आनंद हिरावून घेणारी, फार मोठा अडसर होऊन बसलेली परिस्थिती निर्माण करणारी आमच्या जी. एम्. मॅडमची ही व्हिजीट मला त्या अस्वस्थतेत एखाद्या भयंकर संकटासारखीच वाटत राहिली! .. पण प्रत्यक्षात मात्र ती माझ्यासाठी ‘त्या’नेच घडवून आणलेली इष्टापत्तीच ठरणार होती हे मला कुठं माहित होतं?

इष्टापत्तीच नाही तर काय? कारण ठरल्याप्रमाणे शुक्रवारी मॅडम आल्या आणि अचानक घटनाच अशा घडत गेल्या कीं मनातली अस्वस्थता क्षणार्धात विरूनच गेली..!

फार मोठ्ठं संकट भासणारी ही जी. एम्. मॅडमची व्हिजीट संकट नव्हे तर माझ्या पुरता तरी एक शुभशकूनच ठरला होता!!

क्रमश:…  (प्रत्येक गुरूवारी)

©️ अरविंद लिमये

सांगली (९८२३७३८२८८)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ मनामनातील वेताळ… लेख क्र. ३ ☆ श्री संदीप सुंकले (दास चैतन्य) ☆

श्री संदीप सुंकले (दास चैतन्य) 

? मनमंजुषेतून ?

☆ मनामनातील वेताळ… लेख क्र. ३ ☆ श्री संदीप सुंकले (दास चैतन्य) 

स्पर्धा…

सध्या अनेक प्रकारच्या आणि अनेक विषयांवर स्पर्धा भरवल्या जातात, घेतल्या जातात, आयोजित केल्या जातात. त्या त्या क्षेत्रातील गुणवत्ता यातून झळकावी, योग्य उमेदवारास संधी मिळावी, त्याचे कौतुक व्हावे असा यामागील उदात्त हेतू असावा असे सामान्य मनुष्याला वाटणे अगदी स्वाभाविक म्हटले पाहिजे…! सदर स्पर्धांचा थोडा अधिक अभ्यास आणि विचार करताना असे लक्षात आले की यामागे वर नमूद केलेला उदात्त उद्देश नसून त्याला अनेक कंगोरे जोडले गेले आहेत. यामागे अर्थकारण तर आहेच, पण त्यातील स्पर्धा ही निव्वळ गुणवत्तेवर न राहता ती आता सामाजिक माध्यमांच्या ताब्यात, पर्यायाने काही मुठभर लोकांच्या ताब्यात गेली असल्याचे आपल्या लक्षात येईल…! आता महान गायक/गायिका व्हायचे असल्यास त्या अथवा तिला रियाज करायला लागेल की नाही ते सांगता येणार नाही पण सामाजिक माध्यमांवर जास्तीतजास्त लाईक्स मिळवणे बंधनकारक…!! *”पतिव्रतेच्या माथी धोंडा, वेश्येला मणीहार”* असा हा प्रकार नव्हे काय?

उदा. म्हणून विचार केला करूया. संगीत ही एक साधना आहे. साधना करून एखादी विद्या किंवा त्या विद्येत प्राविण्य प्राप्त करता येते. पण ते सुध्दा सामाजिक माध्यमांवर अवलंबून ठेवले गेले, किंवा तसे प्रस्थापित केले गेले तर कोणी साधना करण्याच्या फंदात पडणार नाही, आणि काहीही करून यश संपादन करण्याची चुकीची सवय लागू शकेल…

पटतंय ना?

समाज जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात अशा वृत्ती फोफावल्याचे आपल्याला आढळून येईल. वानगीदाखल वरील संगीत क्षेत्राचे उदाहरण दिले आहे. IPL सारखे सामने सुध्दा याचीच री ओढत नाहीत असे म्हणता येईल…? अशा फोफावलेल्या विविध क्षेत्रांतील समाजाने एकत्र येऊन बहिष्कार घातला पाहिजे असे आपल्याला वाटतं नाही का?

हा वेताळ थोडेसे गोंडस रूप घेऊन आपल्या सर्वांच्या निव्वळ मानगुटीवर नव्हे, तर मनावर राज्य करू लागला आहे, त्याला वेळीच आपण सर्वांनी आवर घालण्याची गरज आहे असे सुचवावे वाटते…

बदलत्या जमान्यात स्पर्धांचे प्रकार आणि स्वरूप बदलत गेले…!! ती स्पर्धा आता प्रत्येकाच्या घरापर्यंत पोचली आहे असे म्हटले तर अतिशयोक्ती ठरणार नाही. आता दोन भावांमध्ये स्पर्धा आहे, नव्हे इर्षा आहे, दोन बहिणींमध्ये, नव्हे ती आता मायलेकी पर्यंत पोचली आहे…!! पटतंय ना?

सकाळ, दुपार, संध्याकाळ याप्रमाणे मनुष्याच्या जीवनात बाल्य, तारुण्य आणि वृद्धावस्था येणे अगदी नैसर्गिक आहे. त्यानुसार शरीराची कांती आणि केसांचा रंग आणि आयुष्य कमीअधिक असणे नैसर्गिक नव्हे काय? वयाच्या पंचविशी मध्ये तसा दिसणे आणि पन्नाशीला मी पन्नाशीसारखा दिसणे हे अपेक्षित नव्हे काय? पण आता यात बदल होताना दिसत आहे. मुलगी आणि आई छान दिसतात असे म्हणणे अगदी स्वाभाविक आहे. दोघी सारख्या दिसता असे म्हणणेही स्वाभाविक म्हणता येईल… , पण आता आयांना मुलीपेक्षा तरुण दिसण्यात धन्यता वाटू लागली आहे… , याला विकृती पेक्षा चांगला शब्द माझ्या मनात येत नाही…

एक कथा आहे. एका राजाला तरुण दिसायचे होते म्हणून त्याने आपल्या मुलाकडून तारुण्य मागून घेतले तरी त्याचे समाधान झाले नाही… , या कथा नाहीत तर आरसा आहेत… , आरसा पाहून आपण आपली दृष्टी नव्हे दृष्टीवर बसलेला वेताळ हाकलून द्यायला हवा…

पहा, पटतंय का?

लेख : तिसरा 

© श्री संदीप सुंकले (दासचैतन्य)

मो. 8380019676

 ≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ‘मकर संक्रांति…’ ☆ श्री दिवाकर बुरसे ☆

श्री दिवाकर बुरसे

? इंद्रधनुष्य ?

☆ ‘मकर संक्रांति…’ ☆ श्री दिवाकर बुरसे

– – – कालचक्राच्या तेजोरेषेवर उमटलेली मंगललिपी_

१४ जानेवारी… प्रतिवर्षी, न चुकता याच दिवशी सूर्यनारायण आपला मार्ग बदलतो. धनुराशीच्या परिभ्रमणातून मुक्त होऊन तो मकर राशीत प्रवेश करतो. आज बुधवार, माघमासातील षट्तिला एकादशी. दक्षिणायनाच्या तमोमय सावल्या मागे पडायला लागून उत्तरायणाच्या तेजस्वी प्रभेने सृष्टी नवचैतन्याने पुलकित होते. ही केवळ खगोलीय संक्रांती नव्हे; ही भारतीय जीवनतत्त्वज्ञानाची, ऋतुसंवेदनशील संस्कृतीची मंगलघोषणा आहे!

*खगोलसिद्धांत आणि ऋतुनियती*

पृथ्वीचा अक्ष २३. ५ अंशांनी झुकलेला आहे. या सूक्ष्म विचलनातूनच ऋतूंची महाशृंखला जन्मास येते. हे भाग्य आपल्या सौरमालेतल्या केवळ पृथ्वीवासिनांच उपभोगता येते. सूर्याचे दक्षिणाभिमुख गमन म्हणजे दक्षिणायन, म्हणजे तमातील प्रवास. तर २१ डिसेंबर पासून आरंभ होणारे उत्तरायण, म्हणजे प्रकाशाभिमुख गमन. मकरसंक्रांती हा विशेष योग. आता यापुढे दिनमान दीर्घ होते, रात्र संकुचित होते. तमोगुणाचा क्षय आणि सत्त्वगुणाची वृद्धी, हा सृष्टीचा सनातन धर्म.

*भूमाता, कृषिसंस्कृती आणि धान्यवैभव*

मकरसंक्रांती ही भूमातेच्या उदरात दडलेल्या समृद्धीची आरती आहे. शेतांमध्ये ज्वारी, हरभरा, गहू इ. धान्यांची पुष्ट कणसे लहरत असतात. वावरात बसून आगटीत भाजलेला शाळूचा हुरडा हवेत खरपूस, रसना चाळवणारा सुगंध पसरवतो, आणि तरुणाईच्या हर्षोल्हासात ऋतू आपले अस्तित्व प्रकटवतो. भाजलेला लिंबोर (गव्हाच्या भाजलेल्या लोंब्या) आणि हरभऱ्याचे घाटे, सर्वांनी एकत्र बसून, हसतखेळत खाणे हे ग्रामीण जीवनातील सामूहिक आनंदाचे प्रतीक आहे.

उसाच्या रसातून सिद्ध झालेला गूळ म्हणजे सूर्यतेजाचे सघन मूर्तरूप. तीळ – एक अतिसूक्ष्म तैलबीज, पण उष्णता, स्निग्धता आणि ऐक्य यांचा अमृतकुंभच. शिशिर ऋतू शी संघर्ष करण्यासाठी निसर्गाने मानवाला दिलेले दिव्य रसायन आहे.

*ग्रामीण जीवनातील संस्कार आणि संक्रांतोत्सव*

गावाच्या प्रभाती संक्रांतीचे रूप अलौकिक असते. गोमयाने सारवलेल्या अंगणात रेखाटलेल्या रांगोळ्यांतून सप्ताश्वरथरूढ सूर्य, धान्यांची कणसे, ओंब्या, लोंब्या, काही ताठ उभी तर काही किंचित झुकलेली तृणपाती, आकाशात भ्रमणारे रंगीबेरंगी पतंग सजीव होतात. देव्हाऱ्यात आदित्य-नमस्कार, आणि अंतःकरणात प्रकाशाची आराधना होते. पुजेत कुंभाराने आणून दिलेल्या सुगडांना हळदकुंकू लावून, त्यात उसाचे कर्वे, पिकलेली आंबटगोड बोरे, बिब्याची फळे, हरभऱ्याचे घाटे, गव्हाच्या लोंब्या इ. वस्तू भरायच्या. तोंडावर पणत्या ठेऊन, त्याला सुताचे दोरे गुंडाळून ती सुगडे पुजायची.

*साखरेची आभूषणे व भेटवस्तूंची लयलूट*

महाराष्ट्रात नववधू, गर्भवती स्त्रिया आणि बालके यांना हलव्याची आभूषणे लेववून त्यांचे कौतुक केले जाते. हा हलवा म्हणजे जीवनाच्या नव्या अंकुरांना दिलेले अश्वासक, संरक्षक कवचच जणू! समाजाच्या सामूहिक ममतेचा आणि सौभाग्यकामनेचा सुस्वर उच्चार! मातृत्व, सुपीकता आणि ऐहिक-मंगलता या संकल्पना येथे एकरूप होतात.

महाराष्ट्रात संक्रांतीच्या दिवसांत अजून एक वैशिष्ठयपूर्ण प्रथा आहे. सुहासिनींचा हळदीकुंकवाचा सोहळा. हा संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत चालू राहतो. हा स्त्रीजीवनाच्या आपुलकीचे, सौभाग्याच्या साखळ्यांचे आणि सामूहिक आनंदाचे लोभस दर्शन असते. मृदू पावलांनी, ओठांवर स्मित घेऊन स्त्रिया एकमेकींच्या उंबरठ्यांवर येतात. यजमानीणबाई त्यांच्या ओट्या भरतात—जणू शुभेच्छांचे धान्यच पदरात ओततात. तिळगुळाच्या गोडव्याने संवाद मधुर होतो, हलव्याच्या उबेत मायेचा ओलावा मिसळतो.

एखादी छानशी, संसारोपयोगी भेटवस्तू हातावर ठेवली जाते आणि या मंगल देण्याघेण्याला ‘वाण लुटणे’ असे अर्थगर्भ नाव लाभते. लढवय्या मराठ्यांच्या परंपरेतून जन्मलेला हा शब्द येथे रणाचा नाही, तर ऋणानुबंधांचा उद्घोष करतो. ही लूट असते—प्रेमाची, सौभाग्याच्या कामनांची, आणि नात्यांच्या बळकटीची. तलवारीऐवजी येथे मृदू हात उचलले जातात, विजयाचे प्रतीक म्हणून नाही, तर माणुसकीच्या, ऐक्याच्या आणि स्त्रीसौख्याच्या मंगल जपासाठी.

अशा प्रकारे संक्रांतीच्या या सोहळ्यात स्त्रीजीवनाचा अंतःप्रवाह उजळतो—परंपरा, संवेदना आणि संस्कार यांच्या संगमातून मराठी संस्कृतीचे एक नाजूक, पण तेजस्वी रूप प्रकट होते.

*भोगी : अन्नब्रह्माचा महोत्सव*

संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी अवतरते. स्वयंपाकघरात साकारलेला ब्रह्मयज्ञ. बाजरीच्या तीळ लावलेल्या भाकऱ्या, वांगी, गाजरे, मटार, पावटा यांची लेकुरवाळी भाजी, तांदूळ-मुगाची खिचडी, त्यावर शुभ्र खोबरे – कोथिंबिरीची भुरभूर आणि वरून अन्न शुद्धीची संतत धार! ताक, लोणी, तीळ -दाण्यांची चटणी, पापड असा षड्रसयुक्त आहार ऋतुनुकूल, शरीरबलवर्धक आणि सत्त्वप्रधान असतो. असे भोजन म्हणजे मातृस्नेहाचा रसास्वाद!

भारतातील विविध प्रांतांतही हाच भाव वेगवेगळ्या पाकसंस्कृतींत प्रकटतो. दक्षिणेत पोंगल, उत्तरेत लोहडी, पश्चिमेत उंधियू, पूर्वेत भोगाली बिहू. धान्य, डाळी, भाज्या, गूळ, ताक, लोणी, तूप या सर्वांतून अन्नब्रह्माची उपासना घडते.

*लोकजीवन, क्रीडा आणि नादसंस्कृती*

संक्रांतीच्या दिवशी नभांगण चंचल पतंगांनी गजबजते तेव्हा, भूमीवर आनंदाच्या लाटा उसळतात. कबड्डी, कुस्ती, खो-खो, बैलगाडा शर्यती अशा क्रीडांप्रकारांतून शौर्य, बल आणि संघभावना व्यक्त होते.

ओव्या, भारुडे, लावण्या, भलरीगीते, सुगीगीते अशी लोकगीते ऋतूंच्या शब्द-नादरूप अनुभूती आहेत. ढोलकीचा ताल, तुणतुण्याचा टणत्कार, हलगीची थाप शिशिरऋतूच्या शीतलतेवर उष्णतेची शिंपण करतात.

*कृष्णवस्त्रे, वेशभूषा : यामागचे विज्ञान आणि इतिहास*

महाराष्ट्रात संक्रांतीला काळी वस्त्रे परिधान करण्याची परंपरा आहे. काळी वस्त्रे सूर्याची उबदार किरण अधिक प्रमाणात शोषून घेतात. त्यामुळे शीतापासून संरक्षण होते ही त्यामागील भौतिकशास्त्रीय संकल्पना. तथापि, या कृष्ण वस्त्र परिधान करण्यामागे एक इतिहासाची वेदनाही अंतरी ठसठसत असते.

पानिपतच्या तिसऱ्या संग्रामातील (सन १७६१) मराठ्यांचा याच संक्रांतीच्या दिवशी झालेला घोर पराभव! मराठ्यांचे हे केवळ सैनिकी अपयश नाही, तर तो संपूर्ण समाजमनावर उमटलेला खोल घाव आहे. त्या दुःखद स्मृतीचा, पण त्याच वेळी स्वाभिमानाचा रंग म्हणजे कृष्णवर्ण. दु:ख गिळून जीवनोत्सव साजरा करण्याची मराठी मानसिकता संक्रांतीच्या दिवशी या कृष्णवर्ण वस्त्रांतून व्यक्त होते.

*पौराणिक संदर्भ*

महाभारतीय महायुद्धात घायाळ झालेल्या पितामह भीष्माचार्यांनी उत्तरायणाची प्रतीक्षा करून देहत्याग केला, म्हणून हा काळ पुण्यप्रद मानला जातो. षट्तिला एकादशीला तीळस्नान, तीळदान, तीळहोम यांना विशेष महत्त्व आहे. सूर्यदेवाची उपासना म्हणजे तेज, आरोग्य आणि दीर्घायुष्याची कामना.

*संगीतातील ऋतु-प्रहर- स्वरसौंदर्ययुक्त संक्रात*

भारतीय शास्त्रीय संगीतात ऋतु आणि प्रहर यांचे नाते सनातन आहे. मकरसंक्रांतीच्या ब्रह्ममुहूर्तात राग भटियार, बैरागी, भैरव आपल्या गंभीर, स्थिर, सात्त्विक स्वरांनी वातावरण पवित्र करतात. हे राग म्हणजे उगवत्या सूर्याचे नादावतार! दिवसाच्या उत्तरार्धात आणि रात्रिप्रहरी भूप, यमन, शिवरंजनी यांसारखे राग आपापल्या समयमर्यादेत निसर्गाशी संवाद साधतात.

*समारोप : उत्तरायण अंतर्मनाचे*

मकरसंक्रांती म्हणजे केवळ सूर्याचे मकरसंक्रमण नव्हे; ते मानवाच्या चेतनेचे उत्तरायण आहे. तमातून तेजाकडे, शैत्यातून उष्णतेकडे, विसंवादातून माधुर्ययुक्त सुसंवादाकडे नेणारी ही पर्वणी आहे. निसर्ग, कृषी, अन्नधनधान्य, इतिहास, स्वर, नाद ताल आणि समाज, या सर्वांचा समन्वय येथे साकारतो.

सूर्य जसा उत्तराभिमुख होतो, तसाच मानवाचा अंतःप्रवाह सत्त्व, श्रम आणि सद्भावनेकडे प्रवाहित होवो, हीच मकरसंक्रांतीची मंगलकामना!

© श्री  दिवाकर बुरसे

१४ जानेवारी २०२६

पुणे

संपर्कः ९२८४३००१२५, ९५५२६२९२४५

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ युगप्रवर्तक स्वामी विवेकानंद… ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

? विविधा ?

☆ युगप्रवर्तक स्वामी विवेकानंद ☆ प्रस्तुती : श्री सुहास रघुनाथ पंडित 

* ‘राष्ट्रीय युवा दिन‘ – – *स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिन १२ जानेवारी हा भारतात राष्ट्रीय युवा दिनम्हणून संपन्न होतो. या प्रेरणादायी दिनाच्या शुभेच्छा !!*

*”उठा, जागे व्हा, आणि ध्येय साध्य होईपर्यंत थांबू नका. धैर्य हेच जीवन आहे आणि भ्याडपणा हे मृत्यूचं लक्षण आहे. प्रेम म्हणजे जीवन तर द्वेष म्हणजे मृत्यू. मी हे करू शकत नाही असं कधीही म्हणू नका, कारण तुमच्या अंर्तमनात प्रचंड शक्ति आहे. या शक्तिच्या मदतीनं तुम्ही अशक्य वाटणारं कामही शक्य करून दाखवू शकता. तुम्ही जसा विचार कराल तसे व्हाल. दुर्बल समजलात तर दुर्बल व्हाल. तेव्हा, उठा जागृत व्हा. तुम्ही जसा विचार करता तसे बनता. स्वतःला घडविण्यात एवढे व्यस्त रहा की इतरांचे दोष काढण्यासाठी वेळच मिळणार नाही.”*

*इति.. स्वामी विवेकानंद*

*भारतररत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात.. अलीकडच्या शतकात भारताने निर्माण केलेला सर्वात मोठा माणूस म्हणजे विवेकानंद. तर सुभाषचंद्र बोस म्हणतात.. आम्ही विवेकानंदांना आधुनिक राष्ट्रीय चळवळीचे ‘आध्यात्मिक पिता’ म्हणतो.*

*सन १८९३.. शिकागोतील जागतिक सर्वधर्म परिषदेतील पहिल्याच वाक्याला सतत दोन मिनिटं टाळ्या वाजत होत्या. प्रथमच समस्त जगाला एकसूत्रात जोडले गेले. “अमेरिकेतील माझ्या बंधू आणि भगिनींनो”.. या भगवाधारीने पहिल्याच वाक्याने जग जिकंले. या वाक्यातील हिंदू संस्कृतीचा उदात्त भाव जगाला लक्षात आला. जगात प्रथमच कुणीतरी जगाशी भावाबहिणीचे पवित्र नाते जोडले होते.*

*आज १२ जानेवारी. याच दिवशी जगाला प्रत्येक ‘जीव हा शिव आहे’ हे हिंदू धर्म सहिष्णूतेचे अव्दैत वैदिक तत्त्वज्ञान.. भारतीय योगदर्शन जगाला सांगणाऱ्या या एका तेजस्वी संन्यासाचा जन्म झाला.. नरेंद्रनाथ दत्त. १८६३ साली जन्म कलकत्ता. वडील तत्कालीन वकील. आई भुवनेश्वरी धार्मिक प्रवृतीची. जगात ओळख निर्माण झाली स्वामी विवेकानंद.*

*जनतेच्या उद्धारासाठी त्यांना गुरुमंत्र देणारे दैवी पुरुष जगविख्यात गुरू लाभले रामकृष्ण परमहंस. त्यांचे कार्य पूढे नेण्यासाठी विवेकानंदांनी रामकृष्ण मठाची स्थापना केली. सर्वप्रथम भारत भ्रमण करुन जनतेची दुःख बघितली. माणसातील सुप्त मनुष्यत्व जागविण्यासाठी.. वेदान्त विचार जगाला पटविण्यासाठी सर्वधर्म परिषदेत मातृभूमीचा सेवक म्हणून भाग घेतला.*

*अमेरिका.. इंग्लंड.. युरोप दौऱ्यात त्यांच्या मानवतावादी तेजस्वी व्यक्तीमत्वाचा.. वाणीचा.. मानवतावादी विचारांचा एवढा प्रभाव पडला की जगाला उर्जा देणारे युगपुरुष ख्याती झाली. स्वामी विवेकानंदामुळे जगाची भारताकडे बघण्याची दृष्टीच बदलली. जगात भारतीय तत्त्वज्ञानाचे महत्त्व पटले. स्वामी विवेकानंद म्हणजे जीवनात उर्जा देणारे.. गीता सांगणारे आधुनिक श्रीकृष्णच.*

*विवेकानंदांची अचाट बुद्धिमत्ता.. स्मरणशक्ती.. ज्ञानार्जनाची क्षमता सारेच विस्मयकारी.. अविश्वसनीय पण सत्य आहे. प्रत्येक विचार जीवनात प्रेरणादायी आहेत. यामुळेच आज बेलूरचा मठ असो वा कन्याकुमारीचे स्वामी विवेकानंद स्मारक ही आमच्या साठी ऊर्जा स्थाने आहेत.*

*स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिन १२ जानेवारी हा भारतात ‘राष्ट्रीय युवा दिन’ म्हणून संपन्न होतो. या प्रेरणादायी दिनाच्या शुभेच्छा !!*

*स्वामी विवेकानंदांनी आम्हाला धीरता.. शूरता.. वीरता आणि विद्येसह नम्रता.. सज्जनांचे रक्षण आणि दुर्जनांना शासन हा गुरु मंत्र दिलाय. हा गुरुंचा वारसा आपण चालवू या. अशा या युगपुरुषाला जन्मदिनी विनम्र अभिवादन.*

*एक सुराने गाऊ आम्ही*

*स्वामीजींची गाथा*

*स्वामीजींच्या पदरेणूने*

*पावन भारतमाता*

*भारतभूचे दैन्य बघोनी*

*अवतरले जगतात*

*दया, क्षमा, करुणा अन साहस*

*वसे सदा हृदयात*

 *

*निर्भयता, सामर्थ्याचा संदेश*

*दिला जगतास*

*ज्ञानरवीचा उदय जाहला*

*तम गेला अस्तास*

 *

*देश-विदेशी गमन करोनी*

*सांगितला वेदांत*

*सर्व जगाला मंत्र दिला हो,*

*उत्तिष्ठत जाग्रत*

 *

*त्याग, विवेक नी वैराग्याला*

*बाणविले अंगात*

*अवघे जीवन अर्पित केले*

*देशाच्या सेवेत*

 *

*ध्यानधारणा आणि तपस्या*

*असा घेतला ध्यास*

*रामकृष्ण गुरु आशिष देती*

*अपुल्या प्रिय शिष्यास*

 *

*सार्थक केले दीक्षा घेऊन*

*नाम विवेकानंद*

*ब्रह्मपरायण नरनारायण*

*अनुभवती स्वानंद*

 *

*वंदन करितो तुमच्या चरणी*

*आम्ही स्वामीराया*

*नरनारायण सेवेसाठी*

*झिजो आमुची काया*

 *

*गीत : स्वामी श्रीकांतानंद* 

 

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती : श्री सुहास रघुनाथ पंडित 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ परिमळु… ☆ सौ शालिनी जोशी ☆

सौ शालिनी जोशी

🔅 विविधा 🔅

☆ परिमळु… ☆ सौ शालिनी जोशी

अवचिता परिमळु झुळकला अळुमाळु

तो मी म्हणे गोपाळु आला गे माये

माऊलींचा हा अभंग वाचला आणि परिमळु या ठिकाणी मन घुटमळले. परिमाळु किती सुंदर शब्द! त्यात गोडवा आहे. तरलता आहे. प्रेम आहे. परिमाळु म्हणजे आपण नेहमी म्हणतो तो सुगंधच. पण माऊलींचा तो अवचिता, झुळकला आणि अळुमाळु आहे. तीनही विशेषणे वैशिष्ट्यपूर्ण आहेत. तो अचानक येणारा, वाऱ्याच्या झुळके सारखा, थोडा थोडा आहे. कारण तो गोपाळाच्या (आत्मारामच्या) आगमनाची सूचना देणारा आहे. ज्ञानेश्वरांच्या विरही मनाला जाणवलेला आहे. त्यांच्यातल्या विरहिणीने केलेले हे वर्णन. ही भाषा माऊलीनाच शोभते.

परिमळु म्हणजे परिमल, सुगंध, गंध, सौरभ, दरवळ, सुवास असे बरेच शब्द असले तरी आपल्याला वास येतात ते फळांचे, फुलांचे. खरंतर वासाचा उगम पृथ्वीतत्वात आहे. गंध हा पृथ्वी तत्वाचा गुण. पहिला पाऊस पडल्यावर जो मृद्गंध परिसर सुगंधित करतो, सर्वांना हवाहवासा वाटतो, तो हाच. तो शुद्ध व पवित्र, ज्याला भगवंत आपली विभूती मानतात. ’ पुण्यो गंध: पृथिव्याम्’ (गी. ७/९) तो हाच. कारण पृथ्वी हे सगळ्या गंधांचे मूळ आहे. जे जे पृथ्वी तत्वातून निर्माण झाले, त्यात गंध हा गुण आला. पण प्रत्येकाचा गंध वेगळा. कसा ते शब्दाने सांगता येत नाही. तो अनुभवावाच लागतो.

हजारो प्रकारची फुले आहेत. पण गुलाबाचा गंध राजेशाही, मोगऱ्याचा गोडसर, सोनचाफ्याचा लपून न राहणारा. म्हणून गदिमा म्हणतात, ’ लपविलास तू हिरवा चाफा, सुगंध त्याचा लपेल का? ’ सुगंध हा काव्य विषय झाला. तो कुपित भरून ठेवता येत नाही. मनाच्या कुपीतच त्याला स्थान. पण एक फुल हातात घेतलं की, ओंजळ मात्र सुवासाने भरून जाते.

केवडा, रात्रराणी, निशिगंध, शेवंती इत्यादी फुलांबरोबर फळांचे, पानांचे व मुळांचे वेगवेगळे गंध असतात. आंबा, फणस, पेरूचे वास घर भरून टाकतात. कढीलिंब, कोथिंबीर पानं खाद्य पदार्थाची चव वाढवतात. आलं, बासमती तांदूळ, केशर, कापूर, चंदन, मसाल्याचे पदार्थ किती म्हणून सुगंध सांगावे? त्याला सीमाच नाही. वासाचा मनाबरोबर शरीरावरही परिणाम होतो. म्हणून ‘आरोमा थेरपी’ नावाची वैद्यकशास्त्राची शाखा निघाली. त्याचा उपयोग मन शांत करण्यासाठी, ताण व अस्वस्थता कमी करण्यासाठी होतो. असा सुगंध जादूगार आहे. म्हणून दिवाळीत चंदनाचा साबण, मोगऱ्याचे तेल वापरतो. आयुर्वेदातही ज्येष्ठमध जटामांसी अशा सुगंधी वनस्पतींचा वापर केला जातो.

 या सुगंधापासून परफ्युम, उद्बत्त्या, सुगंधी मेणबत्त्या, अत्तरे, साबण, शाम्पू, सौंदर्यप्रसाधने, फर्शी पुसायचे द्रव्ये, कुंकू, अष्टगंध इत्यादी कितीतरी वस्तू तयार केल्या जातात. त्यामुळे उद्योगधंदे वाढले. असे आपले जीवन गंधमय आहे. सकाळी उठल्यावर वापरायची पेस्ट किंवा दंतमंजन शब्द तयार झाले. गंध, सुगंध, दरवळ, दर्प, वास, दुर्गंध सगळे वासाशी संबंधित पण वापरताना वेगवेगळ्या परिस्थितीत वेगवेगळा शब्द. मंदिरातील धुपाचा मंद दरवळ, सुगंध म्हंटल की अत्तराची कुपी, दुर्गंध म्हटलं की गटार, सुवास नाकाला हवाहवासा वाटणारा, उग्र दर्प काहीसा नकोसा, दुर्गंध म्हटलं की गटार नकोसा. वास सरसकट वापरला जाणारा, फुलवाल्याकडे संमिश्र दरवळ, भाजीवाल्याकडे कांदा, लसूण, कोबी, मुळे असे उग्र वास. कोऱ्या कपड्यांचा आणि कोऱ्या पुस्तकांचाही वेगळाच, घामाचा कुबट वास, तंबाखू तपकिरीलाही आणखी वेगळा वास. अशी ही गंध कहाणी वाढवावी तेवढी वाढवारी. पण एवढे मात्र खरे,

सुगंध हे निसर्गाचे देणे

नसे भाषा आकार रूप लेणे

तरीही हवाहवासा वाटतो

प्रपंच परमार्थात साथीदार तो

 

©  सौ. शालिनी जोशी

संपर्क – फ्लेट न .3 .राधाप्रिया  टेरेसेस, समर्थपथ, प्रतिज्ञा मंगल कार्यालयाजवळ, कर्वेनगर, पुणे, 411052.

मोबाईल नं.—9850909383

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “संक्रांत… भोगी…” ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी ☆

सुश्री नीता कुलकर्णी

? मनमंजुषेतून ?

☆ “संक्रांत… भोगी…” ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी

जानेवारी आला की आठवते संक्रांत… त्याच्या आधीचा दिवस भोगीचा.. त्या दिवशी भोगीची भाजी, तीळ लावलेली बाजरीची भाकरी, मुगाची खिचडी आणि कढी करायची आपली परंपरा आहे.

काय म्हणता… भोगीची भाजी तुमच्याकडे कोणाला आवडत नाही…

मी एक गंमत सांगते तुम्हाला..

तशी भाजी करून बघा बरं…

मटार, चवळी, घेवडा, डबल बी, वाल पापडी, तुरीच्या शेंगा, पावटा यातील ज्या मिळतील त्या शेंगा घेऊन यायच्या. त्याच्या आतले दाणे (बीया) काढायचे. कोवळ्या शेंगा चिरून घ्यायच्या. मीठ घालून हे सगळे कुकरमध्ये शिजवायचे. फ्लॉवर लवकर शिजतो. म्हणून तो थोड्या पाण्यात वेगळा शिजवून घ्यायचा. वांगी, गाजर पण घेऊ शकता. दोन बटाटे मध्यम आकारात चिरून, तेलात तळून बाजूला ठेवायचे. त्याच तेलात कुटलेलं आलं, लसूण, मिरची घालायची. टोमॅटो घालून चांगले परतायचे. मग त्यात शिजवलेल्या भाज्या, फ्लॉवर, बटाटा घालायचे व मीठ घालायचं. ही कोरडी भाजी झाली. रस्सा हवा असेल तर थोडं पाणी घालायचं.

झाली भोगीची भाजी…

आता मजा सांगते…

साई सकट दूध कढईत आटवायचं.

(भाजीच्या प्रमाणात) भाजी गॅसवरून खाली घेतली की कोरड्या भाजीत हे घालून मिक्स करायचं. छानशा बाऊलमध्ये भाजी काढायची. कडेला टोमॅटोच्या चकत्या ठेवायच्या.. मुलांना सांगायचं तुम्ही हॉटेलात तीनशे रुपयाला घेता ना.. ती आज तुमच्यासाठी स्पेशल

” मलई नवरत्न व्हेज”

बनवली आहे कार्टी(खूप दिवसांनी हा शब्द वापरला) उड्या मारत आवडीने खातात.

रस्सा केला तर आवडीनुसार मसाले घालायचे.

बाजरीच्या पुरी एवढ्या छोट्या भाकरी तीळ लावून करायच्या..

त्या खाताना मुलांना गंमत वाटते…

गरम तेलात जिरे घालून त्यात भात कालवला.. थोडसं मीठ घातलं की जिरा फ्राईड राईस…

भातात या ऊकडलेल्या भाज्या व मीठ घातले की प्लेन व्हेजिटेबल राईस तयार…

तुरीच्या सरबरीत वरणात तिखट, मीठ घालायचं भरपूर लसूण घालून फोडणी दिली की” लसुणी तडका डाल ” या भाताबरोबर खायला..

यात मेथी किंवा पालक घातला की नाव फक्त बदलतं आणि त्याची किंमतही वाढते..

पोळी तूप टाकून दोन्ही बाजूने छान कुरकुरीत करून घ्यायची. त्याचे दोन भाग करायचे. त्यावर पिझ्झा सॉस लावायचा आणि ही कोरडी भाजी टाकायची. त्यावर चीज पसरायचे आणि पोळी फोल्ड करायची की झाली मुलांची आवडती फ्रॅकी तयार…

आपले पूर्वज फार ज्ञानी होते. त्यांनी हवामान, ऋतू यांना अनुसरून आपला आहार पौष्टीक कसा होईल हे विचारपूर्वक ठरवले आहे.

आपली भारतभूमी सुजलाम सुफलाम आहे. अनंत प्रकारच्या भाज्या, फळं या दिवसात मिळतात.

ती खाल्ली जावीत हा या मागचा हेतू आहे. आरोग्य आपोआप सांभाळले जाते.

रुढी आणि परंपरा म्हणून आपण त्या कराव्यात. त्यात थोडेसे बदल केले की या भाज्या मुलांनाही आवडतील. त्याच्या मागचे शास्त्र आणि हेतू मात्र मुलांना समजावून सांगावा. त्यांच्या भाषेत सांगितले की त्यांना ते पटते.

मल्टीग्रेन च्या नावाला भूलून महाग गोष्टी कशाला घ्यायच्या? आपली पारंपरिक भाजणी काय आहे…

त्यात पालक, मेथी, कांदा घालून केलेली थालपीठ…

कसली भारी लागतात…

जवार कुरकुरे खाण्यापेक्षा ज्वारीच्या पिठात तिखट, मीठ, कांदा, कोथिंबीर घालून केलेलं थालीपीठ खा…

काकडी, कांदा, काॅर्न, सिमला मिरची तुपावर परतून घ्या. ती थालपीठावर घाला. थोडा साॅस घाला. वरून चीज घातलं की थालीपीठ पिझ्झा तयार…

लेकरं चवीनी खातात..

घरची मुग डाळ, तांदूळ घालून केलेली खिचडी गार झाली की घट्ट होते. हॉटेलातली डाळ खिचडी कशी मऊसर पातळ असते.

द, तूप घालून भात करून घ्यायचा.

मूग डाळ शिजवून त्यात कढीपत्ता, लसूण, कोथिंबीर घालून त्याला फोडणी द्यायची. खायच्या वेळेस जेवढं पाहिजे तेवढीच डाळ व भात… दोन्ही प्रमाणात घेऊन गरम करायचं. त्यावर ताजी फोडणी घालायची…

हॉटेलात दीडशे रुपयाला मिळणारी डाळ खिचडी रेडी…

पापडाचे चार तुकडे करून तळून घ्यायचे. (एक एक तुकडा उचलून खाता येतो) त्यावर बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, चाट मसाला घालायचा. वर शेव भुरभुरली की मसाला पापड तयार…

आहे काय नाही काय…

मिलेटस म्हटलं की फार काहीतरी वेगळं आहे असं हल्ली वाटतं. आपली जवस, तीळ, खोबरं,

शेंगदाणा यांची एकत्रित चटणी केली तीला” मिक्स मिलेट्स ” म्हटंल की त्याचं वजन वाढतं… तरुणाईला जी भाषा आवडते.. समजते.. ती वापरायची…

घरच सकस, अन्न खायची सवय आपणच मुलांना लावूयात. भोगीला अजून अवकाश आहे. आधीच हे करून बघा… आणि कशी झाली ते मलाही सांगा. आपली हिंदू संस्कृती किती महान आहे… तुमच्या लक्षात आले असेल…

हे आपल्याच निरामय, आरोग्यपूर्ण जीवनासाठी आहे. वर्षानुवर्षे चाललेली आपली परंपरा जतन करून ठेवूया. तरच ती पुढच्या पिढीला समाजेल.

© सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी

मो 9763631255

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ माझी जडणघडण… – आमचं घरटं – भाग – ७२ ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

??

☆ माझी जडणघडण… – भाग – ७२ ☆ सौ राधिका भांडारकर ☆

(सौजन्य : न्यूज स्टोरी टुडे, संपर्क : ९८६९४८४८००)

आमचं घरटं

ज्योतिकाच्या लग्नाच्या वेळी माझी आई बोरिवलीला करुणा हॉस्पिटल मध्ये अॅडमिट होती. तिची प्रकृती अत्यंत गंभीर होती. छुंदाचे (माझी धाकटी बहीण) पती श्री. रमेश चाफेकर आईजवळ होते आणि त्यांनी छुंदाला, “तू काळजी करू नकोस मी मम्मा जवळ आहे. ज्योतिकाच्या लग्नाला तू निश्चिंत मनाने जा. आईला काही होणार नाही. she is a strong lady. ” असे खात्रीपूर्वक म्हटल्यामुळे छुंदा लग्नाला येऊ शकली होती. लग्नाचा आनंदमय बहारदार सोहळा पार पडत असताना मनोमन कुठल्यातरी कोपऱ्यात आईची आठवण आणि काळजी सतत होतीच.

ज्योतिका सासरी गेली. तिचे सासर मुंबईतले पार्ले येथील. त्याच दिवशी ती आणि साकेत आईला भेटायला करुणा हॉस्पिटलमध्ये गेले. आई तशी ग्लानीतच होती. हळूहळू ती जीवनाच्या पलीकडे सरकत होती. कुणाला ओळखेनाशी झाली होती पण ज्योतिकाने जवळ जाऊन “मम्मा आजी” अशी हाक मारताच आईने अर्धवट डोळे उघडले. तिच्याकडे पाहिलं. तिच्या गळ्यातल्या मंगळसूत्राला हातात धरले आणि ती हलकेच हसली. तिच्या त्या क्षीण हास्यातही तिचा स्वर्गीय आनंद दडलेला जाणवला. ज्योतिकाच्या लग्नाचा आईने मनोमन खूप ध्यास घेतला होता. ज्योतिका – साकेत गादीवर असलेल्या आईला नमस्कार करण्यासाठी वाकले तेव्हा आईने दोघांच्याही डोक्यावर हात ठेवले. गालावरून हात फिरवले, मुके घेतले. ती काहीतरी बोललीही. शब्द कळत नव्हते पण भाव समजत होते. “सुखी रहा. सुखाने संसार करा, एकमेकांना कधीही अंतर देऊ नका. ”

दोघांचे डोळे अश्रूंनी डबडबले.

२० डीसेंबरला ज्योतिकाचे लग्न झाले आणि ३१ डिसेंबरला आईने जगाचा निरोप घेतला. ती देवाघरी गेली. ज्योतिका चे लग्न होईपर्यंत जणू काही आईने प्राण धरून ठेवले असावेत. अशी असते आई! अशी होती आई! पुन्हा पुन्हा जाणवत राहिले.

या प्रसंगाने आणखी एका गोष्टीची मनात नोंद केली. साकेत, त्याचे आई-वडील आणि त्यांच्या परिवारातले सर्वच किती समंजस आणि भावनांची कदर करणारे आहेत! नुकताच गृहप्रवेश केलेल्या नवदांपत्याला हॉस्पिटलमध्ये मरणासन्न आजीला ताबडतोब जाऊन भेटण्यासाठी पाठवताना तिच्या भावना त्यांनी जाणून घेतल्या होत्या. जीवनातले फार मोठे आशय असेच वेचले जातात.

ज्योतिकाचे लग्न जमल्यापासून ते संपन्न होण्यापर्यंतच्या काळात एक सुखद घटनाही आमच्या जीवनात घडत होती. त्याच दरम्यान ‘संकेत काळे’ नावाच्या एलिजिबल बॅचलरशी मयुराचं मैत्रीचं नातं जुळत होतं. त्यावेळी मयुरा अमेरिकेत मेरीलँडला राहत होती आणि संकेत टेक्सासला होता. बरेच दिवस ते फोनवर एकमेकांशी बोलत होते. अजूनही एकमेकांबद्दल दोघांनाही नक्की काय वाटत होतं ते सांगता येत नव्हतं. एक दिवस मयुरा मला असे म्हणाली होती, “आई तो इतकं बोलतो की कधी कधी माझं डोकं दुखतं पण तो खूप हुशार वाटतो. चौफेर ज्ञानी आहे काहीसा व्यवहारी वाटतो. ठामही आहे शिवाय मनमोकळा आणि प्रामाणिक आहे हे मात्र नक्की. “

“तो उंच आणि देखणा ही आहे अत्यंत हेल्थकॉन्शस आणि क्रीडाप्रेमी आहे. ” हे पण तिने मला सांगितले वास्तविक मयुरा म्हणजे अत्यंत आनंदी वृत्तीची, हसरी, खेळती बागडती, काहीशी बिन्धास्त, खर्चिक वृत्तीची पण अतिशय संवेदनशील मुलगी.

एक दिवस मयुरा आणि संकेत मेरी लँडलाच भेटले. खरं म्हणजे दोघंही एकमेकांकडे आकर्षित झाले होते पण निर्णय काही दोघांनाही घेता येत नव्हता. मयुराने तर हळूहळू त्याच्यातून मन काढून घेण्याचेच ठरवले होते पण त्याचवेळी दुसरी काही प्रपोजल्स बघण्याची तिची मानसिक तयारी होत नव्हती.

दरम्यान सुरेशजी आणि सुमेधाताईंशी (संकेतचे आई वडील) आमचे मधून मधून फोनवर बोलणे होत असे. ते चेंबूरला शेल कॉलनीत राहत. त्यांच्या घरी आम्ही एक दिवस गेलो. घर खूपच लहान आणि नीटनेटकं असलं तरी जरा असुविधांचंच होतं पण का कोण जाणे आमची त्या दोघांशी मात्र खूप चांगली मैत्री जुळली. सुमेधाताई या अतिशय मनमोकळ्या प्रामाणिक, प्राणी पक्षीप्रेमी, अत्यंत धार्मिक आणि भावुक वृत्तीच्या आणि सुरेशजी क्रीडा प्रेमी, दुसऱ्याला सतत मदत करण्याची वृत्ती असणारे, उंच व्यक्तिमत्त्वाचे, स्वतःच्या कपड्यांविषयी अधिक जागरूक असणारे, मनमोकळे, आनंदी असे वाटले. या दोघांचा तारुण्याच्या उंबरठ्यावर असतानाच प्रेम विवाह झालेला होता. सुरेशजी शहाण्ण्यव कुळी मराठा आणि बडोदा स्थित आणि सुमेधाताई सारस्वत, दादर माहीम येथे राहणाऱ्या. पूर्वाश्रमीच्या दळवी. त्यांनी जेव्हा आम्हाला हे सांगितलं तेव्हा माझ्या मनात पटकन आले, साकेतचे पप्पाही मराठा आणि बडोद्याचे आणि सुवर्णाताई सुध्दा सारस्वत, मुंबईतच राहणाऱ्या हॉस्कुटे फॅमिलीतल्या. शिवाय तो साकेत आणि हा संकेत. अरे वा! अर्थात म्हणून संकेत मयुराचे लग्न जुळेलच असा काही बालीश विचार करण्याचे मी तेव्हा नक्कीच टाळले पण ज्योतिकाच्या लग्नाचे आमंत्रण मात्र आम्ही त्या दोघांना दिले. मयुराला फारसं रुचलं नव्हतं पण आमच्या अनेक फ्रेंड्स पैकी हे दोघे असे आम्ही तिला पटवूनही दिले.

सुरेशजी आणि सुमेधाताई ज्योतिकाच्या लग्न समारंभात अगदी आमची खूप जुनी मैत्री असल्यासारखेच मिसळले होते. आमच्या जळगावच्या मित्र-मैत्रिणींशीही त्यांनी ओळख करून घेतली. एकंदरीत ते फार कम्फर्टेबल होते. त्यांना मयुराही अतिशय आवडली. संकेत आणि मयूराची जोडी जमावीच असे त्यांनाही मनापासून वाटत असावे कारण त्यानंतरही त्यांच्याशी फोनवर बोलताना आम्हाला हे जाणवलं होतं.

एक किस्सा त्यांनी सहज बोलता बोलता सांगितला होता तो असा. ते दोघेही संगीत प्रेमी आणि दादरला वाघमोडे यांचं (म्हणजे साकेतचे वडील) ‘महाराष्ट्र ग्रामोफोन अँड वॉच कंपनी, नावाचं जवळजवळ सत्तर वर्षांची परंपरा असलेलं अत्यंत प्रसिद्ध असं म्युझिक हाऊस होतं आणि तिथे हे दोघं संकेतसह नेहमी जात. संकेत तेव्हा लहान शाळकरी अथवा महाविद्यालयीन मुलगा असेल. एक दिवस साकेत वडीलांबरोबर दुकानात आला होता. तोही साधारण संकेतच्याच वयाचा होता. त्याला पाहून तेव्हा सुमेधाताई पटकन म्हणाल्या होत्या, ” अरे! हे दोघं किती सारखे दिसतात! यांचं काहीतरी नातंच असलं पाहिजे असंच वाटतं. नावं पण बघा ना कशी! साकेत आणि संकेत! ” जीवनात येणारे असे हे गमतीदार योगायोगच म्हणायचे का?

ज्योतिकाचे लग्न होण्यापूर्वी आणखी एक योगायोगाची गोष्ट म्हणजे ज्योतिका टेक्सासलाच ऑस्टिन या गावी काही प्रोजेक्टच्या निमित्ताने होती. त्यादरम्यान ती स्वतःच संकेतला डॅलसला जाऊन भेटून आली आणि तिचे संकेत विषयी फारच चांगले मत झाले आणि तिने तसे आम्हाला कळवले.

बरेच दिवस आम्ही या विषयाबाबत तसे न्यूट्रल होतो. किंचित तणाव, दाब होता कारण एखादा.. मग पॉझिटिव्ह अथवा निगेटिव्ह कोणताच निर्णय लागत नसल्यामुळे दुसरे पाऊल उचलता येत नव्हतं. एका रेषेवर सर्व काही ठप्प झालं होतं आणि माझ्यातल्या एलिझाबेथ बेनेटला ते असह्य होत होतं. विलास मात्र शांत होता नेहमीप्रमाणे.

माझे आणि सुमेधाताईंचे मात्र फोनवर छान बोलणे व्हायचे. मयुराची आणि संकेतची पत्रिका कशी जुळते वगैरे अगदी आशावाद बाळगून सांगायच्या. आम्ही तशा इतरही गप्पा मारायचो कारण सुमेधाताई अतिशय स्वच्छ मनाच्या, प्रांजळ वृत्तीच्या असलेल्या जाणवायच्या आणि संकेत त्यांचा एकुलता एक मुलगा त्यामुळे होणाऱ्या सुनेचं मनापासून कोड कौतुक करणारी एक सुंदर स्त्री मी त्यांच्यात त्यावेळी पाहिली. (या माझ्या त्या वेळच्या विचारांना आणि भावनांना आजपर्यंत कधीही धक्का पोहोचलेला नाही हे विशेष.) 

बरोबर एक वर्ष उलटलं असेल. फायनली मयुराने आणि संकेतने एकमेकांशी लग्न करण्याचा निर्णय घेतला.

त्यानंतरच्या विवाहविषयक ठरवलेल्या योजना भराभर उत्साहाने आणि आनंदात पारही पडल्या. लग्नाच्या आधी लग्न करण्यासाठीच एखादा आठवडाच आधी मयुरा आणि संकेत दोघेही एकत्रच भारतात आले. आम्ही मुंबई विमानतळावरच संकेतला प्रथम भेटलो. हा आमचा होणारा दुसरा जावई! मन हरखून गेले. संकेत -मयुराचं हातात हात घालूनच विमानतळावर आगमन झालं होतं. दोघंही इतके छान दिसत होते! कौतुकाने मन भरून गेलं. मनातल्या मनात या सर्व योगायोगांची मांडणी करत असतानाच परमेश्वराचे आभारही मानले.

ज्योतिका- साकेतच्या लग्नानंतर बरोबर एक वर्षाने म्हणजे १८ डिसेंबर २००६ रोजी जळगावलाच, त्याच ओम लॉन्स वर संपूर्णपणे ज्योतिकाच्या लग्नाचा रिप्ले मयुराच्या लग्नाबाबत संपन्न झाला. अत्यंत खेळीमेळीत, पुरोगामी पद्धतीने, तुमचं -आमचं अजिबात नसलेला एक मित्रत्त्वाचा, नव्या नात्याचा सुंदर सोहळा पार पडला. आनंदी आनंद जाहला.

ज्योतिका आणि मयुराच्या लग्नातली कवीवर्य ना. धो. महानोरांची उपस्थिती आणि त्यांनी केलेलं त्यांच्याच कवितांचं गायन हे कायम स्मरणात राहणारं ठरलं.

 काही बोलू नये तिशी

नुसते डोळ्यांशी बुडावे

आणि बेसावधपणी

नुसते आभाळ झेलावे…

महानोरांचं काव्य आणि त्यांचं गावरान कंठातलं गायन.. संगीत समारंभातला एक अत्यंत सुखद क्षण.

मयुराच्या लग्नातली *पुढारी*चे संस्थापक बाळासाहेब जाधव यांची झेड सिक्युरीटीतली उपस्थितीही लक्षवेधी होती.

बाळासाहेब वधुवरांना आशीर्वाद देण्यासाठी मंचावर आले तेव्हा म्हणाले, ”दोघंही भाग्यवान. एकदम अनुरूप! ”

असे ते लाडक्या लेकींचे विवाह सोहळे. आनंदाचे.. सुखाचे.

आमच्या दोन चिमण्या आमच्या उबदार गोजिरवाण्या प्रेमळ घरट्यातून आता मात्र खऱ्या अर्थाने नव्या विश्वात झेप घेण्यासाठी उडाल्या. जरी त्या शिक्षणाच्या निमित्ताने दूरच होत्या तरी आमचं घरटं तेव्हा एकच होतं. दोघींचे विवाह झाले आणि घरट्यातली पोकळी, रिकामपण मात्र जाणवायला लागलं. एकाच वेळी कर्तव्यपूर्तीचे समाधान आणि वियोग, दुराव्याच्या लहरीवर हेलकावे घेत आम्ही दोघं आमच्याच जीवनाकडे साक्षी भावाने मागे वळून पाहत राहिलो. आमच्या सहजीवनातल्या घट्ट वीणेत गुंफलेला तो मोत्याचा क्षण होता..

– क्रमशः भाग ७२.

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

मो.९४२१५२३६६९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “जबरी पहाडिया – तिलका मांझी…” ☆ सौ शोभा जोशी ☆ सौ शोभा जोशी ☆

सौ शोभा जोशी 

? इंद्रधनुष्य ?

☆ “जबरी पहाडिया – तिलका मांझी…” ☆ सौ शोभा जोशी

 ‘स्वातंत्र्याशिवाय जगणे म्हणजे आत्म्याशिवाय शरीर होय ‘असं अमेरिकन फिलाॅसाॅफर खलिल जिब्राननी म्हटलं आहे. इंग्रजांनी आपल्या देशाच्या आत्म्यावरच घाला घातला होता. त्याला इंग्रजांच्याआधिपत्याखालून मुक्त करण्यासाठी म्हणजेच देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी जनजातीतील सुध्दा हजारो लोकांनी प्राणांचे बलिदान दिले. तिलका मांझी हा असाच एक जनजातीतील स्वातंत्र्य सेनानी ज्यानं देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणांचं बलिदान दिलं.

ईस्ट इंडिया कंपनीने बादशहा शाहआलमकडून बंगाल, बिहार व ओरिसा या प्रांतांची दिवाणीची सनद मिळविली. तो १८व्या शतकाचा उत्तरार्ध होता. त्या काळापर्यंत भारतीय राजे जनजातींकडून महसूल वसूल करित नसत. पण जनतेचे अधिकाधिक शोषण करण्यासाठीच इंग्रजांनी भारतीय जनतेवर जबरदस्त महसूल लादला. त्यामुळे त्या भागातील सर्व जमातीच्या लोकांनी इंग्रज सत्तेविरूध्द लढे दिले. इंग्रजांनी, भारताच्या पूर्व व दक्षिण भागातील प्रदेश सर्वप्रथम गिळंकृत केल्याने याच भागातील भारतियांनी सर्वप्रथम त्यांना विरोध केला. म्हणून या भागातील क्रांतीवीर आद्यक्रांतीकारक ठरतात. त्यातील तिलका मांझी हा इंग्रजांविरूध्द लढणारा पहिला क्रांतिकारक ठरला.

बिहारच्या, बंगालला लागून असलेल्या राजमहल व भागलपूरमधल्या पहाडातील संथाल जमातीचा तिलका मांझी हा एक बहाद्दूर, शूरवीर व कुशल संघटक होता. त्याने या प्रदेशातील हिंदू-मुस्लीमांसह अन्य जातींमधीलही लढवय्यांचे उत्तम संघटन करून इंग्रजी सत्तेशी प्राणपणाने टक्कर देऊन आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली.

तिलकाचा जन्म ११ फेब्रुवारी १७५० रोजी सुलतानगंज ठाण्याअंतर्गत तिलकपूर या गावी, संथाल जमातीतील मुर्मू समाजात झाला. डोंगर दर्‍यातील निवासामुळे त्याचे शरीर दणकट बनले होते. त्याच्या अंगी असलेल्या ताकदीमुळे त्याला जबरा पहाडिया म्हणत. परंपरागत शिकारीचा व्यवसाय असल्याने तो नेमबाजीत तरबेज तसेच धाडसी होता. त्याच्या अंगी एक अध्यात्मिक शक्ती होती. ती त्याला कशी प्राप्त झाली माहित नाही. पण तो जे म्हणेल तसेच घडून येई असं म्हणतात. त्याच्या सात्विक जीवनपध्दतीमुळे तरूणांचा त्याच्याकडे सतत ओढा असायचा. त्याच्या अंगी असलेल्या अध्यात्मिक शक्तीमुळे लोकांची त्याच्यावरची श्रध्दा वाढू लागली. कोणत्याही जाती धर्माच्या लोकांविषयी त्याच्या मनात भेदभाव नव्हता. लोकांचा छळ करणार्‍या इंग्रजांना आपल्या प्रदेशातून हाकलून द्यायचा त्याने दृढसंकल्प केला.

… भागलपूर मध्ये आपल्या संकल्पपूर्तीसाठी तो तरूणांच्या गुप्त सभा घ्यायचा. ‘ एकी हेच बळ ‘हे त्याला माहित होतं म्हणून आदिवासी हिंदू व मुसलमानांचे त्याने एक उत्तम संघटन केले. ते सर्व लोक लहानपणापासूनच निशाणबाजीत तरबेज होते. वनवासींची जमीन, शेती, जंगलं, झाडं यावर इंग्रजांनी अधिकार गाजवायला सुरूवात केली होती. इंग्रज, त्यांचे दलाल, जमीनदार, सावकार हे सर्व मिळून करीत असलेल्या शोषणाविषयी तिलकाने लोकांमध्ये जागृती निर्माण केली आणि इंग्रजांना आपल्या देशातून हाकलून लावायचे याविषयी त्यांची मने तयार केली.

गंगेच्या काठच्या प्रदेशातून मार्गो व तेलियागदी या दर्‍यांमधून येणारा जाणारा इंग्रजांचा खजिना लुटून गोरगरीबांच्यात वाटून टाकण्यास त्याने सुरूवात केली. तो अत्यंत निःस्वार्थी होता. सन १७७६ मध्ये आॅगस्टस क्वीवलॅंड राजमहलचा मॅजिस्ट्रेट म्हणून आला. त्यानंतर तो भागलपूरचा मॅजिस्ट्रेट झाला.

गंगा व ब्राह्मी नद्यांच्या दुआबातील जंगल तराईच्या प्रदेशात तसेच मुंगेर, भागलपूर व संथाल परगाण्यात तिलकाच्या इंग्रजांशी अनेक लढाया झाल्या. तिलका मांझी त्यांना पुरून उरला. त्याच्या नेतृत्वाखालील वनवासी इंग्रजांना भारी पडत होते. इंग्रजांनी रामगढ कॅम्पवर ताबा मिळवला होता. तिलकाने पहाडिया सरदारांना बरोबर घेऊन १८७८मध्ये इंग्रजांचा पराभव करून रामगढ कॅम्प मुक्त केला.

जानेवारी १७८४ रोजी तिलका मांझीने भागलपूरवर चढाई केली. एका ताडाच्या झाडावर चढून त्याने, घोड्यावरून जात असलेल्या क्लीवलॅंडच्या छातीवर बाण मारला. क्लीवलॅंड तात्काळ घोड्यावरून खाली पडला आणि लगेच मरण पावला. त्याच्या निधनाने इंग्रज सैन्य हबकून गेले आणि मार्ग सापडेल तिकडे पळून गेले.

 – तिलका मांझीचा विजय झाला. त्याचे सैन्य विजयाचा आनंद साजरा करत असताना रात्रीच्या अंधारात सर आयर कूट व पहाडिया सरदार यांनी मिळून तिलका मांझीच्या बेसावध सैन्यावर अचानक हल्ला केला. त्या लढाईत तिलका मांझीचे बरेच सैनिक मारले गेले आणि पुष्कळसे गिरफ्तार करण्यात आले. तिलका मांझी आपल्या उरलेल्या सैनिकांसह सुलतानगंजच्या डोंगरात आश्रयाला निघून गेला आणि पुढची योजना ठरवू लागला. नंतर काही महिने त्याचे सैन्य इंग्रज सैन्याला आणि पहाडिया सैनिकांना गनिमीकाव्याने लढून बेजार करत होते.

तिलका मांझीचा पाडाव कसा करावा या विचाराने सर आयर कूट संत्रस्त झाला होता. त्याने तिलकाचे आश्रयस्थान असलेल्या डोंगरांना वेढे दिले. त्यांना बाहेरची रसद मिळू दिली नाही. अन्नपाण्यावाचून तिलकाच्या सैनिकांचे हाल होऊ लागले. तेव्हा गनिमीकाव्याने लढणे सोडून त्याने इंग्रजांशी आमने – सामने लढायचे ठरविले. आपल्या सैन्यासह तो डोंगर उतरून खाली आला व निकराने लढू लागला. त्या लढाईत धोक्याने तिलका इंग्रजांच्या हाती सापडला. त्याला जेरबंद करण्यात आले. सर आयर कूट त्यामुळे आनंदाने बेहोश झाला. त्याने तिलका मांझीला दोरखंडाने बांधून चार घोड्यांकरवी भागलपूरपर्यंत रस्त्यावरून फरपटत नेले. त्याचे अंग अंग सोलून निघाले तरी तो जिवंत राहिला. सर आयर कूटने त्याला भागलपूरच्या एका झाडावर फाशी दिली. नंतर त्याचे प्रेत त्या वडाच्या बुंध्याशी बांधून त्याच्या छातीत मोठे मोठे खिळे ठोकले. अशाप्रकारे या महान आदिवासी नेत्याने स्वातंत्र्याच्या बलिवेदीवर आपल्या प्राणांची आहुती दिली.

– – – स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भागलपूरमधील त्या चौकाला ‘ तिलका मांझी चौक ‘ असे नाव देण्यात आले आणि त्या चौकात एक चबुतरा उभारून त्यावर तिलका मांझीच्या पुतळ्याची प्रतिष्ठापना करण्यात आली…… त्याचे नाव स्वातंत्र्याच्या इतिहासात अमर झाले.

– – १३ जानेवारी हा तिलका मांझीचा बलीदान दिवस आहे – –

©  सौ शोभा जोशी.

कार्यकर्ती, जनजाती कल्याण आश्रम, पुणे महानगर. 

मो ९४२२३१९९६२ 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares