मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ किसी राह में… किसी मोड पर… ☆ डॉ. धनंजय देशपांडे ☆

डॉ. धनंजय देशपांडे

? इंद्रधनुष्य ?

☆ किसी राह में… किसी मोड पर…  ☆ डॉ. धनंजय देशपांडे 

हल्ली “रियुनियन” हा प्रकार (म्हणजे कार्यक्रम) होतात न – लहानपणीचे मित्र नंतर मोठे झाल्यावर एकमेकांचे पत्ते शोधून व्हाट्स ग्रुप करतात आणि नंतर कधीतरी ठरवून एक दिवस पिकनिकला जातात.

…. तर असाच एक ग्रुप पिकनिकवर येतो. मात्र यात एक थोडा बदल केलेला असतो की, प्रत्येकाने आपल्या जीवन साथीदाराला सोबत आणायचे.

सुरुवातीला याला काहीजण विरोध करतात. पण शेवटी हो ना हो ना करत करत सगळे तयार होतात आणि पिकनिक निघते.

शाळेतल्या त्यावेळच्या सर्वांच्या लाडक्या हेडमास्तर गुरुजींना चीफ गेस्ट म्हणून सोबत घेतलं जात.

*

वाटेत गप्पा गाणी जोक्स सुरु असतात. विशेषतः नवरा बायकोवरच्या जोक्सची संख्या जास्त असते. त्यातही खासकरून “बायका” विषयावर जास्त.

आणि शेवटी सगळेजण छान मूडमध्ये बुक केलेल्या रिजॉर्टवर पोचतात. बँगा वगैरे ठेवून झाल्यावर थोडं फ्रेश होऊन सगळेजण रिजॉर्टच्या त्या हॉलमध्ये जमतात. त्यावेळी हेडमास्तरांना भाषण करण्याची विनंती केली जाते.

ते म्हणतात, “आज मी भाषण करणार नाही पण तुमचा आग्रहच आहे तर इथे भिंतीवर एक बोर्ड आहे ते लक्षात आल्यावर वाटलं की एक गेम खेळूया”

सगळेजण एकदम खुश. “कसला गेम गुरुजी? ” विचारतात

“थांबा न एक मिनिट” असं म्हणून गुरुजी तिथल्या एका महिलेला उठवून समोर बोलावतात. आणि सांगतात की

“इथे बोर्डवर अशा तीस लोकांची नावे लिही, जे तुला आवडतात. ”

ती मग नावे लिहिते. त्यात सुरुवातीला आई वडील पती मुलं, इतर नातेवाईक मग शेजारी, ऑफिसातले सहकर्मचारी अशी यादी लिहिते.

गुरुजी तिला म्हणतात, “आता यातली अशी दहा नावे पुसून टाक जी फारशी आवडत नाहीत किंवा नसली तरी चालतील अशी”

ती मग ऑफिसातल्या दहा जणांची नावे पुसते.

गुरुजी आता सांगतात, “अजून दहा नावे पुसून टाक”

ती मग शेजारी लोकांची दहा लोकांची नावे पुसते.

गुरुजी : “आता शिल्लक दहा मधून अजून पाच पूस”

ती मग नातेवाईकाची पाच नावे पुसते.

आता शिल्लक राहतात तिचे आई, वडील, पती, आणि दोन मुले

गुरुजी : आता यातली २ नावे पूस

ती गोंधळते पण धीर करून स्वतःच्या आई वडिलांचे नाव पुसते

(आता हॉल मध्ये बसलेले सगळेच हळूहळू गंभीर होत जातात. कारण आता हा गेम राहिला नसून ती महिला जणू स्वतःचे मन समोर मांडत आहे असं लक्षात येत.)

गुरुजी : आता तीन नाव राहिली त्यातली दोन पुसुन टाक

ती थोड्या उदास मनाने दोन्ही मुलाची नावे पुसते.

**

शेवटी फक्त पतीचे नाव शिल्लक राहते. गुरुजी तिला हलकेच थोपटून शांत करतात.

हॉलमध्ये सन्नाटा.

शेवटी गुरुजी तिला विचारतात.

“आता सुरुवातीपासून तू जसे जसे नावे पुसत गेलीस त्यामागचा तुझा विचार सांग”

ती सांगू लागते, “सुरुवातीला मी ऑफिसातली नावे पुसली. कारण ते तर सतत बदलत असतात. नंतर मी शेजाऱ्याची नावे पुसली. कारण शेजारी सुद्धा आयुष्यभर तेच असतील असे नाही. तेही बदलत असतात किंवा आपण तरी घर बदलून दुसरीकडे जाऊ शकतो म्हणून ती पुसली.

नंतर नातेवाईकाची पुसली. कारण नात्याची असली तरी शेवटी ती लांबच असतात. कठीण प्रसंगी ते येतीलच असं नाही.

नंतर खूप धीर एकवटून आई वडिलांची नावे पुसली. कारण त्यांनी अतिशय छानपणे मला वाढवून कर्तव्य पार पाडलं आहे. समाधानी आहेत ते आणि कसलीच अपॆक्षा माझ्याकडून त्यांना नाही. सध्या दोघेही ऐशीच्या घरात आहेत. आज न उद्या त्यांची साथ सुटणार आहेच. म्हणून पुसली.

शेवटी मुलांची नावे मात्र काळजावर दगड ठेवून पुसली. कारण मुलं मोठी झाल्यावर त्यांना माझी गरज असेलच असे नाही किंवा कदाचित भविष्यात ते परदेशी सुद्धा जाऊ शकतात. त्यामुळे ती पुसली.

मात्र माझा पती शेवट्पर्यंत अगदी शेवटच्या श्वासापर्यंत सोबत राहणार आहे. याची मला खात्री आहे. कारण तसे आमचे एकमेकांचे सहजीवन आहे. आणि विशेष म्हणजे या तुमच्या शाळेचे ते माजी विद्यार्थी आहेत. मी नाहीय. पण तुम्ही सर्वानी आम्हालाही सामावून घेतले. त्याचाच आनंद जास्त आहे. ”

असं म्हणून ती थांबली. पूर्ण हॉल मध्ये एकदम शांतता पसरली. आणि अचानक गुरुजींच्या टाळ्यांचा आवाज झाला. त्यात इतरांनीही त्याच्या टाळ्यांचा कडकडाट मिसळला.

*

गुरुजीं म्हणाले, “जी बाब हिने सांगितली ती खरीच आहे. त्याचप्रमाणे ते सर्व इथल्या पुरुषांनाही लागू असणार. त्याच्याही लिस्टमध्ये शेवटचं नाव पत्नीचेच असणार, याची मला खात्री आहे”

असं म्हणून गुरुजींनी खिशातून मोबाईल काढून त्यातून एक गाणं निवडून क्लिक केलं….

*

किसी राह में, किसी मोड़ पर

कहीं चल न देना तू छोड़ कर

मेरे हमसफ़र, मेरे हमसफ़र

मेरे हमसफ़र, मेरे हमसफ़र

किसी हाल में, किसी बात पर

कहीं चल न देना तू छोड़ कर

मेरे हमसफ़र, मेरे हमसफ़र

*

डॉ. डीडी क्लास : मात्र आयुष्याच्या प्रवासात काही कारणाने या “हमसफर”चा हात सुटला, मार्ग वेगळे झाले तरी आजवर एकत्र असताना छान जगलेले काही क्षण आठवून पुढे जात राहावे, ना की कटू आठवणी सतत सोबत ठेवत स्वतःला त्रास करून घ्यावा. कारण न जाणो पुढच्या एखाद्या वळणावर वेगळ्या भूमिकेतून ती हमसफर व्यक्ती समोर आली तर छानसे हसून दोन शब्द बोलता आले तरी पुरे….. त्यावेळी “कसा आहेस ” किंवा “कशी आहेस” इतकं म्हणत एखादी मस्त कॉफी घ्यावी अन “मिलते है ब्रेक के बाद” म्हणावं!

© डॉ. धनंजय देशपांडे (dd)

(सायबर सिक्युरिटी तज्ञ, चित्रकार, लेखक, समुपदेशक, निवेदक)

मो न. ९४२२३०४३४४ 

1) Global Cyber Crime Helpline National Award winner

2) Digital Hero of the year National Award winner

3) HOD: Cyber Awareness Foundation, Maharashtra State

4) Mentor: Pune University (SPPU), CANADA and UK

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचतांना वेचलेले ☆ संवाद…  – कवी : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. शीतल कुलकर्णी ☆

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ संवाद…  – कवी : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. शीतल कुलकर्णी 

संवाद कुठे हरवले?

इकडे तिकडे शोधून पाहिले

नाही कुठे सापडले

अरेच्चा !

हे तर मोबाईलमध्ये जाऊन बसले.

*

बोटांना काम मिळाले

तोंडाचे काम कमी झाले

शब्द मुके झाले

मोबाईलमध्ये लपून बसले

 *

हाय’ करायला मोबाईल

बाय’ करायला मोबाईल

GM करायला मोबाईल

GN करायला मोबाईल

*

शुभेच्छांसाठी मोबाईल

भावपूर्ण श्रद्धांजली’ साठीही मोबाईल

खरेदीसाठी मोबाईल

विक्रीसाठी मोबाईल

नाटक, सिनेमांची तिकिटं मोबाईलवर

बस, ट्रेन, विमानाची तिकिटं मोबाईलवर

शाळा, कॉलेजची फी मोबाईलवर

डॉक्टरांची फी मोबाईलवर

*

वेळंच नाही येत आता दुस-यांशी बोलण्याची

बोलता बोलता चेह-यावरचे भाव टिपण्याची

वेगवेगळ्या ‘इमोजी’ धावून येतात मदतीला

दुधाची तहान ताकावर भागवायला

*

आता शब्द कानांना सुखावत नाहीत

आता शब्द ओठांवर येत नाहीत

आता शब्द कोणी जपून ठेवत नाही

आता शब्द-मैफल कुठे भरतच नाही

*

मोबाईलवरील संवादाला अर्थ नाही

प्रत्यक्ष संवादातील मौज इथे नाही

आभासी जगातले संवादही आभासी

अशा संवादांचा आनंद नाही मनासी

*

या आभासी संवादांना मूर्त रूप कधी मिळेल का?

नक्की सांगा माणूस खरंच ह्रुदयापासुन संवाद साधेल का ?

 

कवी: अज्ञात

प्रस्तुती :सौ. शीतल कुलकर्णी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ विजय साहित्य # २६८ – जननी घराची…! ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆

कविराज विजय यशवंत सातपुते

? कवितेचा उत्सव # २६८  – विजय साहित्य ?

☆ जननी घराची…!

(वृत्ताचे नाव – दिंडी, वृत्त प्रकार – मात्रावृत्त, वृत्त मात्रा संख्या – १९, मात्रांची विभागणी – ९ + १०)

चार शब्दांची, मिळे साथ जेव्हा

शोध कवितेचा,लागलाय तेव्हा.

छंदात पाया, खणविला कवीने

वृत्तांत तिजला,बसविले खुबीने. १

*

गणांच्या समुहा, नवे रूप आले

छंदात रमता, स्वयें संत झाले

काव्यात रमता,पदी पंत आले

वाद्यात रमले,आणि तंत झाले. २

*

जनांची कविता जनी बोलताना

रसिकांस ठेवी हृदी नांदताना

सौंदर्य आले, कवींच्या घराला

अर्थात रमली,गृही शब्दबाला. ३

*

ओवीत आली, घरातील माया

लागली कविता,घरे गाजवाया

कधी जोजविले, मुला नादवीले

भुपाळीमधुनी,घरा जागवीले.४

*

गीतात आली,घरंदाज नारी

जीच्या दर्शनी,घराला उभारी

अशी‌ ही कविता,नवे नाम घेते

नव्याने कविता,‌ नवे धाम देते.५

*

नाना प्रकारे, घरे जोडताना

वैश्विक झाली, मने वाचताना

रमे कल्पनेत, तिथे मुक्त झाली

बंधाविना ती,जगण्यासी आली.६

*

कविताच आहे,मने जोडणारी

जननी घराची, घरे बांधणारी

शोधात जाता,घरांच्या तिच्या रे

कविता मनाच्या,तळाशी पहा रे.७

© कविराज विजय यशवंत सातपुते

सहकारनगर नंबर दोन, दशभुजा गणपती रोड, पुणे.  411 009.

मोबाईल  8530234892/ 9371319798.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ केशवाच्या सुता पुसा तुम्ही ☆ डाॅ. विष्णू वासमकर ☆

डाॅ. विष्णू वासमकर

? कवितेचा उत्सव ? 

☆ केशवाच्या सुता पुसा तुम्ही ☆ डाॅ. विष्णू वासमकर☆ 

कवितेचा तीर | विस्तारेल कोण

ऐसा नही जाण | भूमीवरी

भूमीवरी साऱ्या | कवी फार झाले

दुरापास्त झाले | रसिक ते

रसिकांनी साऱ्या | कवीला छळावे

कवीला तळावे | तेलामध्ये

तेलामध्ये कवी | तडफडतील

बडबडतील | काही बाही

काहीबाही काही | कविता करिती

करून दाविती | लोकांमध्ये

लोकांना वाटले | कवी हे माजले

माजले कसले | पुंड झाले

अशा ह्या कवींना | काय समजावे

समजुनी घ्यावे | कवितेला

कविता नव्हे ही | एक पोरखेळ

जमुनीया तोल | यावा लागे

यावे लागे बोल | निखळ अस्सल

प्रतिभेचे बोल | असती हे

अस्सल प्रतिभा | आणि व्युत्पत्ती

अभ्यासे निष्पत्ती | काव्यकला

आकाशीची वीज | असते कविता

केशवाच्या सुता | पुसा तुम्ही

© डाॅ. विष्णू वासमकर

सांगली

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “खरे देवदास्य अंगिकारलेली लक्ष्मी…” ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

☆ “खरे देवदास्य अंगिकारलेली लक्ष्मी…” ☆ श्री संभाजी बबन गायके

भारतरत्न श्रीमती एम. एस. सुब्बुलक्ष्मी

खरे देवदास्य अंगिकारलेली लक्ष्मी!

ओम… शुक्लांबरधरंविष्णू शशिवर्णम चतुर्भुजं… 

कौसल्यासुप्रजा राम पूर्वा संध्या प्रवर्तते

उत्तिष्ठ नरशार्दूल कर्तव्यं दैवमाह्निकम…

– – – तिच्या मुखातून उमटलेले हे शब्द आधुनिक ध्वनिमुद्रण आणि ध्वनिप्रक्षेपण सुविधेच्या मत्कारामुळे देशभरातल्या सर्वसामान्य लोकांच्या घरा-घरांत घुमू लागले तेंव्हा पहाटवेळा रोमांचित होऊ लागल्या! याला यावर्षी उणीपुरी ३० वर्षे पूर्ण होताहेत.

पण गाण्याची ही काही तिची पहिलीच वेळ नव्हती. १६ सप्टेंबर १९१६ रोजी जन्मलेली ही कन्या कुंजम्मा… म्हणजे गोड मुलगी म्हणून संबोधली जायची. तिच्या नावातला पहिला इंग्रजी M तिच्या जन्मस्थळाचे मदुराईचे नाव मिरवतो. तर S म्हणजे ष्णमुखावदिवू अर्थात सहा मुखांनी सुशोभित कार्तिकेय. स्त्री असूनही पुरुष देवतेचे नाव धारण करणारी ही कुंजम्माची माता. वीणा वाद्य खूप उत्तमरीतीने वाजवणारी कलाकार. सुब्बुलक्ष्मी म्हणजे धनाची देवी. जन्माने देवदासी अर्थात देवाच्या सेवेत काया-वाचा-मन आणि नृत्यगीताच्या माध्यमातून समर्पित जीवन.

आई, शक्तीवेल नावाचा एक भाऊ आणि वदिवंबल नावाची एक बहीण असे चौघांचे कुटुंब मदुराईत हनुमन्तायार कोईल गल्लीत राहायचे. समाजाने गरीब महिलांवर लादलेलं हे देवदास्य पुढे औपचारिकरीत्या संपुष्टात आले असले तरी देवदासी महिलांचा उदरनिर्वाह आरंभी प्रामुख्याने गायन, वादन आणि नृत्यावरच चालत असे. एम. एस. यांना शालेय शिक्षण फारसे लाभले नाही. मात्र गाण्याचे शिक्षण मात्र सहजी मिळाले… एक नवी देवदासी तयार होत होती. वयाच्या दहाव्या वर्षी एम. एस. ने पहिले सार्वजनिक गायन सादर केले आणि काहीच वर्षांत तिची पहिली ध्वनिमुद्रिकासुद्धा निघाली! अर्थात देशाच्या इतर भागांत एम. एस. ची कीर्ती पोहोचायला आणखी काही वर्षांचा अवकाश होता.

गोष्ट १९३२ मधली आहे. कुंभकोणम मध्ये महामखम महोत्सव सुरु होता. के. सुब्र्हमण्यम नावाचे चित्रपट दिग्दर्शक मुख्य आयोजक होते. मुख्य गायकांना यायला काहीसा उशीर होत असल्याचे बघून एम. एस. च्या मातोश्रींनी आयोजकांना गळ घातली आणि बालिका एम. एस. पहिल्यांदा हजारो लोकांसमोर गायल्या…. त्यादिवशी त्यांना आणखी एकदा गाण्याची संधी मिळाली… मोठमोठे गायक उपस्थित होते त्या मंचावर. एम. एस. चे नाव झाले!

मदुराईमधील मंदिरांचा आणि तिथल्या श्रीमंत पुरुषांचा आश्रय सोडून एम. एस. आणि त्यांची आई मोठ्या संधीच्या शोधात चेन्नई (तत्कालीन मद्रास) शहरात आल्या. चौदा वर्षांच्या सुब्बुलक्ष्मी त्यांच्या अंगभूत गायनकौशल्यामुळे आणि सौंदर्यामुळे लवकरच लोकांच्या नजरेत भरल्या. तिथल्या एका मोठ्या संस्थेसाठी गायल्यामुळे तर त्यांना खूपच प्रसिद्धी मिळाली. आनंद विकटन नावाच्या एका मासिकाने त्यांची मुलाखत प्रसिद्ध करण्याचे ठरवले. मुलाखत घेतली टी. सिवदासन नावाच्या एका व्यक्तीने. त्या मासिकाचे हे जाहिरात प्रतिनिधी त्यावेळेच्या इंग्रज सरकारविरोधात क्रांतिकार्य करीत असत आणि त्यासाठी त्यांना तुरुंगावासही घडला होता. सिवदासन यांनी मुलाखतीतून एम. एस. च्या पूर्वायुष्यातही डोकावले..

के. सुब्र्हमण्यम यांनी १९३८ मध्ये सेवासदनम नावाच्या चित्रपटात एम. एस. यांना संधी दिली आणि तो चित्रपट यशस्वी झाला.. आता कुंजम्मा अभिनेत्री झाल्या होत्या. तोवर सिवदासन यांनी एम. एस. यांच्याशी संपर्क वाढवला होता. त्यांनी एम. एस. यांना आणखी एका चित्रपटात संधी मिळवून देण्यात हातभार लावला… ‘शंकुतलाई’ नावाचा हा चित्रपट सिवादसन यांच्याच कंपनीने काढला होता… हाही चित्रपट चालला आणि एम. एस. मद्रासमध्ये सुस्थापित होण्याच्या मार्गावर अग्रेसर झाल्या!

दरम्यान एम. एस. यांच्या आईने त्यांचा विवाह एका श्रीमंत व्यक्तीशी करण्याचे ठरवले…. देवदासीपणाला जणू त्या शरण जाऊ पाहत होत्या… मात्र एम. एस. यांनी यावेळी बंड पुकारले…. तत्कालीन समाजव्यवस्थेतील छुप्या महिषासुराला या आधुनिक लक्ष्मीने दिलेले हे जणू आव्हानच होते!

…. सुब्बुलक्ष्मी यांनी ठाम नकार दिला.. पण तरीही मातोश्रींनी आग्रह सुरूच ठेवल्याने त्या थेट सिवदासन यांच्या घरी रहायला गेल्या…. हे एक मोठे धाडस होते. दोघांच्या वयात बऱ्याच वर्षांचे अंतर होते. शिवाय सिवदासन विवाहितही होते.. त्यांना दोन कन्याही होत्या! पुढे सिवदासन च्या पत्नीचे निधन झाल्याने त्यांनी एम. एस. यांचेशी विवाहगाठ बांधली. आता एम. एस. एका प्रतिष्ठित माणसाच्या पत्नी झाल्याने देवदासीपणाचा शिक्का पुसला गेला. एम. एस. यांनी नारदाची भूमिका असणारा आणखी एक चित्रपट केला… त्यातही त्यांनी अभिनय आणि गाण्याची चमक दाखवली….

…… इथून पुढे एम. एस. यांचा मीरा होण्याकडे झालेला प्रवास विलक्षण ठरला! संत मीरा यांनी विषाचा प्याला केवळ भक्तीच्या जोरावर पचवला…. देवदासीपण, सामाजिक कुचंबणा, मनाविरुद्ध लग्न ठरवलं जाणं याला एम. एस. यांनी जोरदार विरोध केला…. आणि एका अर्थाने विषाच्या प्यालाच हाती घेतला….. ही मीरा बंडखोर निघाली… पण हिचे बंड स्वरांनी, भक्तीने पुरेपूर भरलेले होते… या स्वरांनी पुढे भक्तीसंगीताच्या जगतात प्रचंड इतिहास घडवला! मूळ दाक्षिणात्य भाषेत असलेल्या मीरा नावाच्या चित्रपटाच्या हिंदी आवृत्तीत एम. एस. मीरा बनल्या आणि पुढे जणू ख-याखु-या आयुष्यात त्या मीराच झाल्या! शास्त्रीय गायन करणा-या एम. एस. सुब्बुलक्ष्मी पुढे प्रामुख्याने भजन, भक्तीसंगीत गायिका व्हायच्या होत्या हे विधिलिखित होते!

सिवदासन यांनी पुढे स्वत:चे मासिक काढले परंतु ते लवकरच कर्जबाजारी झाले. कर्ज फेडण्यात त्यांना त्यांची मोठी संपत्ती विकावी लागली आणि ते भाड्याच्या जागेत राहण्यास गेले. आर्थिक परिस्थिती नाजूक झाली. पण त्याचवेळी प्रत्यक्ष भगवान बालाजी व्यंकटेश त्यांच्या साहाय्याला धावले असे म्हणावे, अशी घटना घडली… आध्यात्मिक क्षेत्रातील काही ज्येष्ठ लोकांनी देवस्थानला सुब्बुलक्ष्मी यांच्यावर आलेल्या आर्थिक संकटाची कल्पना दिली. पण देवस्थान थेट आर्थिक मदत देऊ शकणार नव्हते. त्यावर एक उपाय अंमलात आणावे असे ठरले. भजनाची ध्वनिमुद्रिका काढायची, विकायची आणि त्याचे मोठे मानधन सुब्बुलक्ष्मी यांना द्यायचे!

… बालाजी देवस्थानचे अधिकारी एम. एस. यांना भेटायला त्यांच्या घरी पोहोचले. देवस्थानला आर्थिक मदत व्हावी, यासाठी भजन, श्लोक असलेली ध्वनिमुद्रिका काढायची आहे, असे त्यांनी सांगितले. भगवान बालाजींची एक प्रतिमा त्यांनी भेट म्हणून सुब्बुलक्ष्मी यांना दिली. सुब्बुलक्ष्मी यांचे वय आणि एवढे मोठे जबाबदारीचे काम करणे अवघड आहे, जमणार नाही असे शिवदासन यांनी सांगितले… पण सुब्बुलक्ष्मी यांनी ही देवसेवा विनाविलंब स्वीकारली… पण सुब्बुलक्ष्मी यांनी पैसे घेण्यास स्पष्ट नकारच दिला! त्यांची आर्थिक स्थिती बिकट असताना त्यांनी केवळ परमेश्वराचे काम म्हणून पैशांना नकार दिला! पण खूपच आग्रह झाल्यावर, देवाचा प्रसाद म्हणून, अगदीच नाईलाज म्हणून त्यांनी त्यातील अगदी मोजकी रक्कम स्वीकारली. त्यांच्या आवाजातील ध्वनिमुद्रिका ‘बालाजी पंचरत्नम’ खूप म्हणजे खूपच प्रसिद्ध झाली. त्यातून बालाजी देवस्थानला प्रचंड उत्पन्नही झाले. एम. एस. यांनी त्यांना मिळालेल्या मानधनाचा खूप मोठा भाग सेवाकार्यासाठी दान केला!

शास्त्रीय संगीत गायन ही त्यांची मूळची आवड आणि खासियत. मात्र कर्मधर्मसंयोगाने त्यांच्या गायनात भक्तीसंगीताचे प्रमाण अधिक राहिले… आणि त्यात त्या तल्लीनही होऊन गात. संसारिक समस्या, पूर्वायुष्य, पुरुषप्रधान कुटुंबव्यवस्थेत होणारी मानसिक कुचंबणा या गदारोळात त्यांना स्वत:लाही भक्तीसंगीत मन:शांती देत गेलं असावं. सिवदासन यांच्या राजकीय कार्यातील संबंध आणि सी. राजगोपालाचारी या मोठ्या नेत्याच्या सहकार्यामुळे असेल पण एम. एस. पुढे राष्ट्रीय पातळीवर पोहोचल्या. महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, सरोजिनी नायडू यांच्याशी त्यांचा परिचय वाढला. वैष्णव जन तो आणि अशा अनेक भजनांच्या गायनामुळे एम. एस. म्हणजे सुंदर भक्तीसंगीत ही प्रतिमा अधिकाधिक ठळक होत गेली. त्यात त्यांची समरसता, चेह-यावरील सात्विक भाव, प्रभावी व्यक्तिमत्व आणि आवाजातील वेगळेपण यांमुळे त्यांची भजने लाखो घरांत अगदी पहाटेपासून ऐकली जाऊ लागली.

पुढे त्यांनी म्हणलेलं विष्णूसह्स्र्नाम आणि तत्सम धार्मिक मंत्र संपूर्ण देशात पोहोचले आणि गाजले. सलग चाळीस दिवस एम. एस. यांच्या घरी शास्त्रोक्त पद्धतीने विष्णू सहस्त्रनामाचा जप झाला… एम. एस. यांनी तो मन लावून ऐकला… आणि संपूर्ण तयारी झाल्यावरच त्यांनी ध्वनिमुद्रण केले. आज इतक्या वर्षांनंतरही जगात कुठे न कुठे तरी लाखो घरांत, मंदिरांत एम. एस. सुब्बुलक्ष्मी भक्तीगीते, श्लोक ध्वनीमुद्रिकामधून गात असतात… त्यांचा धीरगंभीर आवाज पहाटवेळा पवित्र करीत जातात. जगभरातील हिंदू धार्मिक लोकांना ही भजने, स्तोत्रे, मंत्र पाठ झाली… पाहिजे तेंव्हा ऐकता येऊ लागली!

आंतरराष्ट्रीय पातळीवरही एम. एस. गाजल्या. भारताच्या धार्मिक परंपरेच्या त्या जणू राजदूतच बनल्या. पद्मभूषण, संगीत नाटक अकादमी पुरस्कार, संगीत कलानिधी पुरस्कार, पद्मविभूषण पुरस्कार, संगीत कलाशिखामणी, कालिदास सन्मान सारखे पुरस्कार त्यांच्यापर्यंत चालत आले… पण सर्वांत संस्मरणीय ठरला तो भारतरत्न पुरस्कार. संगीत क्षेत्रातील व्यक्तीला दिला गेलेला पहिला पुरस्कार त्यांना प्रदान केला गेला!

एम. एस. सुब्बुलक्ष्मी यांनी त्यांना भजन गायनातून मिळालेल्या पैशांचा खूप मोठा भाग धार्मिक संस्थांना दान केला. पती शिवदासन यांनी त्यांच्या कारकिर्दीला त्यांना हवे तसे वळण दिले… खरं तर कोणत्याही कलाकाराला कुणी त्याच्या कलेत हस्तक्षेप केलेला भावत नाही. पण यानिमित्ताने आपल्या स्वरांतून देवाची सेवा होते आहे, दान करता येईल एवढे पैसे मिळत आहेत आणि समाजाची सेवा करता येते आहे.. हे लक्षात घेऊन एम. एस. यांनी सर्व कष्ट उपसले.

देवाच्या नामस्मरणाने त्यांच्या संपूर्ण चरित्रात पावित्र्य आले. अन्यथा त्या केवळ एक गायिका आणि फार तर अभिनेत्री म्हणून आणि एक देवदासीकन्या म्हणून जगल्या असत्या! पण भगवंत पतितपावन आहेत.. हे सिद्ध झाले!

‘देवदासी ते देवाची स्वरदासी’ हा सुब्बुलक्ष्मी ऊर्फ कुंजम्मा यांचा प्रवास मोठा प्रेरणादायी ठरला… परमेश्वराचे नामचिंतन त्यांना घडले आणि ते स्वर आजही जिवंत आहेत.

– – नवरात्री निमित्ताने या लक्ष्मीचा हा प्रवास थोडक्यात मांडला.

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ आई, अजून तू मला हवी आहेस! – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. स्मिता सुहास पंडित ☆

सौ. स्मिता सुहास पंडित

? वाचताना वेचलेले ?

☆ “आई, अजून तू मला हवी आहेस!” –  लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. स्मिता सुहास पंडित 

आई,

ठाऊक आहे का तुला?

चिक्‍कार वेळ बेल वाजवल्यावर

बंद दरवाजाआड

तुझी चाचपडत येणारी पावले

थकलेल्या आवाजात म्हणतात,

‘आले रे…’,

तेव्हा अपराधी जीव

श्‍वास रोखून पडतो भांड्यात दरवेळी,

हे ठाऊक आहे का तुला?

*

खिडकीत बसून अंधाऱ्या उजेडात

सुईत दोरा ओवण्याचा तुझा वाढता

खटाटोप पाहून येतात कढ,

कातर कातर होत जाते मन दरवेळी,

हे ठाऊक आहे का तुला?

*

डाव्या कुशीवर कोपराच्या उशीवर

एकार्त झोपलेल्या तुझा,

मंद श्‍वासोच्छवास निरखताना,

किती धडधडते हृदयात दरवेळी,

हे ठाऊक आहे का तुला?

काही झालेलं नाही रे मला,

तू झोप… होईन मी बरी! ’’

असा तुझाच रुग्णाईत दिलासा

ऐकण्यासाठी ओठंगून उभ्या असलेल्या

माझ्या तथाकथित निरोगी मनाला

पडत जातात कित्येक घरे दरवेळी,

हे ठाऊक आहे का तुला?

*

तिन्हीसांज टळून गेल्यानंतर

खोलीतला दिवा न लावता

बाहेर टक लावून बघत बसतेस

अज्ञातात काहीतरी,

तेव्हा गलबलते हृदयात दरवेळी,

हे ठाऊक आहे का तुला?

*

आजही ह्या वयात

खरकटे तोंड पुसताना,

तुझ्या वृद्ध पदराचा घुरट वास

घेताना मी होत जातो लहान,

आठवते मला माझेच भूत…

खिडकीच्या गजांतून पाय काढून

तुझी चाकरमानी वाट पाहात

बसणारे माझे बालपण…

आठवते दरवेळी,

हे ठाऊक आहे का तुला?

*

अजूनही आहे मनगटावर मौजूद

तू दिलेला कालथ्याचा डाग…

शेजारच्या डोंगरेकाकूकडे

आशाळभूत खाऊ मागितल्याची शिक्षा म्हणून दिलेले ते

माझ्याच दुर्दम्य लोचटपणाचे प्रमाणपत्र

आताशा धुकट झाले आहे,

निबर कातडीवर,

पण तरीही-

सहज जाते नजर त्या डागावर दरवेळी,

हे ठाऊक आहे का तुला?

*

दोस्तांबरोबर रंगवलेली

बाटलीभर मध्यरात्र उतरते क्षणार्धात

वास्तवाच्या विहिरीत

करकरणाऱ्या रहाटासारखी…

तुझ्या एकटेपणाची सावली

हालत राहाते

रात्रदिव्याच्या मंद उजेडात भिंतीवर…

तेव्हा, कोसळून पडतो मी पुन:पुन्हा दरवेळी, हे ठाऊक आहे का तुला?

*

थकलेल्या देहाने वावरत असतेस

खोल्याखोल्यांतून, पुटपुटत असतेस

काहीतरी देव्हाऱ्याकडे पाहात

उसासून,

तेव्हा तुझ्या डोळ्यांत साकळलेले

संध्याकाळचे गडद रंग

किती उदास वाटतात दरवेळी,

हे ठाऊक आहे का तुला?

*

मटार निवडताना बोटांवर चढलेली

हिरवीजर्द जीजिविषु अळी

तुझ्या अंधुक डोळ्यांना होते दिसेनाशी,

हे पाहून हळवे व्हायला होते दरवेळी,

हे ठाऊक आहे का तुला?

 

‘मला मेलीला कशाला हव्यात

साड्या आणखी? ’

असे म्हणत

जुन्या पैठणीवर फिरणारा

तुझा सुरकुतलेला जीर्णशीर्ण हात

पाहून थरथरते काळीज दरवेळी,

हे ठाऊक आहे तुला?

*

एखाद्या संध्याकाळी

“येताना पाच रुपयांची फुलं घेऊन ये रे,

‘त्याच्या’ बोडख्यावर घालायला!”

असे त्राग्याने म्हणतेस,

तेव्हा उगवणाऱ्या उद्याचाही

वाटतो आधार दरवेळी,

हे ठाऊक आहे का तुला?

 

थकलेल्या तुझा शरीराचा

कंटाळलेला वावर करतो उदास

सर्वंकष तरीही-

मनात येते की

प्राक्‍तनाचे गणित नाही जुळले,

पण तुझ्या पदराखाली झाकलेले

सुरक्षित बालपण दृढमूल आहे, अजूनही!

 

आई…

अजून तू मला हवी आहेस.

 

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती : सौ. स्मिता सुहास पंडित 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ गाणे असे मीच व्हावे… ☆ सुश्री किशोरी उपाध्ये

सुश्री किशोरी उपाध्ये

स्व-परिचय 

मी किशोरी उपाध्ये.

झेन्सार टेक्नॉलॉजीज येथे १७ वर्षं नोकरीचा अनुभव.
संगीत विशारद.
आता पूर्ण वेळ लिखाणासाठी देते असून,
कविता, लेख, कथा आणि कादंबऱ्या लिहिते.
अनेक कथा आणि कविता पारितोषिक प्राप्त असून अनेक दर्जेदार अंकांतून छापून आलेल्या आहेत. 🙏🏻
गायन, तसेच जपानी भाषा शिकवते.

? कवितेचा उत्सव ?

☆ गाणे असे मीच व्हावे ☆ श्री हरिश्चंद्र कोठावदे ☆

जे मला वाटते गुणगुणावे।

गाणे असे मीच व्हावे।।धृ।।

शब्द व्हावे निळे अंतरीचे धुके।

ओठी येऊनही राहिले जे मुके।

सूर आळवुनिया त्यांस गावे।।

गाणे असे मीच व्हावे।।१।।

*

वाहते सृष्टिबिंबास धरुनी उरि।

जाऊनी श्यामला त्या नदीच्या तीरी।

गंध वाऱ्यातले पिऊन घ्यावे।।

गाणे असे मीच व्हावे।।२।।

*

डोंगरांचे ऋतू भूमिचे सोहळे।

सूर साऱ्यांतुनी भेटती सावळे।

चांदणे होऊनिया झुलावे।।

गाणे असे मीच व्हावे।।३।।

©  सुश्री किशोरी उपाध्ये

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – क्षण सृजनाचा ☆ ‘चंद्रकंस..’ ☆ श्री दिवाकर बुरसे ☆

श्री दिवाकर बुरसे

☆ क्षण सृजनाचा ☆ ‘चंद्रकंस..’ ☆ श्री दिवाकर बुरसे

अश्विन शुद्ध पौर्णिमेचं ते पूर्णाकार, काहीसं केशरी रंगाचं शशिबिंब नारळीच्या आडून डोकावताना पाहिलं की अंतःकरणात वीणा झंकारू लागते! प्रियेच्या धुंदील सहवासाच्या स्मृती पुन्हा पुन्हा उजळून उठतात, उचंबळून वर येतात. कुंजात, वाटिकेत, ठाई ठाई स्मृतींचे काजवे चमचमतात.

सरोवरात विहार करताना दिसतो एकटाच राजहंस

चंद्रतुषार पिऊन कोण गातोय हा धुंद चंद्रकंस ?

🌻 राग चंद्रकंस 🌻

चंद्रकंस हा कोण गातसे पिउनी चंद्रतुषार

आठवणींच्या प्राजक्ताला आला धुंद बहार! ॥ ध्रु॥

 

अशीन होती रात्र बावरी

नभात होता चंद्र बिलोरी

तू, मी दोघे सागरतीरी

प्रेमा आपुल्या केवळ होता चंद्रच साक्षीदार !

आठवणींच्या प्राजक्ताला आला धुंद बहार ॥ १॥

 

चंदेरी या रेतीवरती

कर माझा तव कटीभोवती

मनात अपुल्या फुलली होती –

असंख्य स्वप्ने, ज्यांना आपण केले गे साकार !

आठवणींच्या प्राजक्ताला आला धुंद बहार ॥ २॥

 

मंत्रघोष घुमविला सागरे

बिंब इंदुचे जळीं थरारे

विसरून आपण जग हे सारे

काया, वाचा, मने जाहलो एकच – पूर्णाकार!

आठवणींच्या प्राजक्ताला आला धुंद बहार ॥ ३॥

 

कातळ हा तो, हीच नारळी

मुग्ध अशी तू, आशिच लाजली

आवेगाने घेता जवळी

मेघामागे अलगद दडला त्याच क्षणी शशि पार !

आठवणींच्या प्राजक्ताला आला धुंद बहार ॥ ४॥

🙏🏽

© श्री दिवाकर बुरसे

पुणे

संपर्कः ९२८४३००१२५, ९५५२६२९२४५

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ कदंब फुलतो… ☆ सौ.रेणुका धनंजय मार्डीकर ☆

सौ. रेणुका धनंजय मार्डीकर

?️?  चित्रकाव्य  ?️?

? कदंब फुलतो… ? सौ.रेणुका धनंजय मार्डीकर ☆

(वृत्त अनलज्वाला, मात्रा-8+8+8=24) 

गडगडणारा ढग येताना कदंब फुलतो

झरझरणाऱ्या पावसधारा कदंब खुलतो ||ध्रु||

*

वरीसवे हलती त्याच्या धुंद शलाका

यमुनाजळही खळखळ खळखळ देते हाका

कान्हासंगे वृंदावनात खेळ खेळतो

झरझरणाऱ्या पावसधारा कदंब खुलतो ||1||

*
चेंडू सुमने केशर कांती फांदीवरती

कान्हासंगे गोप खेळती अवतीभवती

अमृत प्राशन केल्याने हा अखंड झुलतो 

झरझरणाऱ्या पावसधारा कदंब खुलतो ||2||

*
कदंब-नीला वाहत येतो गंधित वारा

कादंबरीस म्हणती सारे कदंब मदिरा

कुसुमामधला सुगंध त्याचा मंजुळ घुमतो 

झरझरणाऱ्या पावस धारा कदंब खुलतो ||3||

*
सोनवर्खिली मोहक सुमने सुगंध देती

कृष्णसख्याला प्रियक होवुनी जवळी घेती

कदंबोत्सवी मम् शब्दांनी उमल उमलतो

झरझरणाऱ्या पावस धारा कदंब खुलतो ||4||

*
सोन केशरी गुबगुबलेली फुले सुगंधी 

मधमाशांचे मोहळ उठते मिळता संधी

शिशुपाल कुणी कुणी हरिप्रिया म्हणुनी गणतो 

झरझरणाऱ्या पावस धारा कदंब खुलतो ||5||

*

© सौ.रेणुका धनंजय मार्डीकर

औसा.

मोबा. नं.  ८८५५९१७९१८

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ तुळस ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

श्री प्रमोद वामन वर्तक  

?️?  चित्रकाव्य  ?️?

☆ तुळस ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

हिरवे काळे कुळ माझे 

औषधी गुणांनी युक्त,

एक पान खा सकाळी 

कफा पासून व्हा मुक्त!

*

फुलांस म्हणती मंजिरी 

त्यात लपती माझ्या बिया,

येतील उपयोगी तुमच्या 

नवीन रोपटे रुजवावया!

*

जगी खास वनस्पती 

मलाच विवाहाचा मान,

पूजेत सत्यनारायणाच्या 

वाहतात सहस्त्र पानं!

*

शोभा वाढवी अंगणाची 

घरा समोरच्या वृंदावनी,

सांज होता मज जवळी 

दिवा लावती सुवासिनी!

*

वीस तास दिसातले 

सोडते प्राणवायू हवेत,

लावून परिसरात रोपं 

करा प्रदूषणावर मात!

करा प्रदूषणावर मात!

© प्रमोद वामन वर्तक

संपर्क – दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.) 400610 

मो – 9892561086 ई-मेल – pradnyavartak3@gmail.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares