मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ चटके… ☆ नीलांबरी शिर्के ☆

नीलांबरी शिर्के

? कवितेचा उत्सव ?

 ☆ चटके नीलांबरी शिर्के 

 जीवनभर चटके मिळता

चटक्यांचे भय ना उरते

हे सोसुन सारे आता

सरणाचे भय कुठले ते!!

*

मी छिन्न नयनबाणांच्या

कायेच्या जखमा शिवते

शब्दांनी विदीर्ण ह्रदया

हळू फुंकर घालत बसते!!

+

मी कणभर गंधासाठी

अनवाणी पावली फिरले

तळपायीच्या फोडांना

अश्रुंनी चुंबीत बसले!!

*

गगनाला भिडण्यासाठी

पंखाची फडफड केली

झेपाऊन उडण्या आधी

मी पंख गमाऊन बसले!!

©  सुश्री नीलांबरी शिर्के

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /मंजुषा मुळे/गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ मौन… ☆ दीपा नारायण पुजारी ☆

दीपा नारायण पुजारी

?विविधा ?

☆ मौन…  ☆ दीपा नारायण पुजारी ☆

मौन म्हणजे चूप राहणं, निशब्द असणं. मौन पाळणं, म्हणजे न बोलणं.

मौन पाळणं जर साधलं तर आपल्या जिभेवर आपला संयम राहतो. मौनात एक विलक्षण सामर्थ्य आहे. न बोलता खूप काही साधता येतं.

मौन राहून एखादं काम करताना एकाग्रता वाढते. वाढलेली एकाग्रता कामातली उत्कटता वाढवते. काम अधिक चांगले होतं.

कधी कधी बोलून सांगून न जमणाऱ्या गोष्टी मौन साधून साधता येतात. मौन साधणारा अंतर्मुख होतो. त्यामुळे तो आत्मपरीक्षण करू शकतो. वरवर सोपी, साधारण वाटणारी क्रिया; आत्मिक उन्नतीचा साधा मार्ग आहे. जसे पैसे वापरले की संपतात. वापर केल्याने वीज संपते, पाणी संपते आणि त्यातील ऊर्जा संपत्ती नष्ट होते. त्याचप्रमाणे आपण बोलून आपली ऊर्जा, आपली शक्ती नष्ट करतो. विजेचा संचय केल्यास ऊर्जा साठून राहते. अगदी त्याचप्रमाणं, मनाचं मौन पाळल्यास आपल्या अंतरीक ऊर्जेचा ऱ्हास थांबतो. आपली शक्ती वाढते.

योग्य वेळी शांत राहणं महत्त्वाचे असतं. मौनामुळं भांडणं, वादविवाद टाळता येतात. शांतता टिकून राहते.

तसं पाहिलं तर, वाणी ही मानवाला मिळालेली देणगी आहे. डोळे, नाक, कान, त्वचा आणि याबरोबरच जीभ हे देखील महत्त्वाचं ज्ञानेन्द्रिय आहे. जिभेचा उपयोग आपण बोलण्यासाठी आणि चव घेण्यासाठी करतो. दोन्हींचा अतिरेक घातकच ठरतो. मौनव्रत म्हणजे मानसिक तपच आहे. परंतु वाणीला विराम देणं इतकं सोपं नाही. सर्वांनाच ते जमत नाही. आपल्यामध्ये काहीजण असे असतात की, त्यांच्या तोंडात तीळही भिजत नाही. न बोलता राहणं अशक्यप्राय असतं बऱ्याच जणांच्यासाठी! त्यांची जीभ सतत चालू असते. विषय कोणताही असो, त्यातील काही माहिती नसली, तरी ते बोलत असतात. बोलण्यासाठी काही असो वा नसो पण त्यांच्या बडबडीत खंड पडत नाही.

समंजस लोक कमी बोलतात.त्यांना त्याचे काही फायदेही मिळतात. काही गोष्टी साध्य होतात.

मौन पाळणं म्हणजे तोंडानं न बोलणं एवढाच मर्यादित अर्थ नाही हं. खाणाखुणा करणं, लिहून दाखवणं, चेहऱ्यावर विविध भाव प्रगट करणं, मान हलवणं यातलं काहीही न करता राहणं म्हणजे खरं मौन. मौनकाळात व्यावहारिक गोष्टींचा विचार करायचा नसतो. कोणते; अगदी कोणतेच विचार मनात आणायचे नसतात. चित्ताची एकाग्रता वाढवण्याचा प्रयत्न मात्र करत राहायचं असतं. म्हणून चिंतन करण्याची कला मौनव्रतामुळे शिकून घेता येते. त्यामुळे विकारांवर ताबा मिळवता येतो. काम, क्रोध, मोह, लोभ, मद आणि मत्सर असे विकार मनात उत्पन्न होत असतात. मनातील विचारांनी या षड्रिपुंना खतपाणी घातलं जातं. विचारांमुळे शरीराची ऊर्जा खर्ची पडते. अस्वस्थता वाढते. केवळ वाणीनेच नाही तर, मनातल्या मनात बोलणेही बंद करता आलं पाहिजे. मग या षड्रिपुंना जिंकता येईल. म्हणून नेहमी नेहमी नाही तरी, प्रसंग परत्वे मौन पाळायला काय हरकत आहे? कारण मुद्देसूद प्रसन्नता देणारं, आनंद देणारं बोलणं ही एक संवाद कला आहे. शब्द चुकले की गोंधळ होतो.

शब्दामुळे दंगल, शब्दांमुळे मंगल|

शब्दाचे हे जंगल, जागृत रहावं||

जिभेवरी ताबा, सर्व सुखदाता |

पाणी, वाणी, नाणी नासू नये ||

तुकाराम महाराजांनी लिहिलेल्या या ओळी किती सार्थ आहेत! जिभेवर ताबा मिळवला पाहिजे हे खरंच आहे.

कधी कधी मौनातही संवाद असतो. म्हणून मौन हे एक असं साधन आहे, जे न बोलता ही सांगण्याचं काम करतं. अर्धा ओरडा करून जे सांगता येत नाही ते मौनात सांगता येतं. मौन म्हणजे स्वतःच्या गोंधळलेल्या भावनांचं संयोजनही असू शकतं. मौन ही एक सकारात्मक, विधानात्मक शैली आहे. शक्तिशाली शैली आहे. कारण, मौन पाळणाऱ्यांच्या आजूबाजूचे लोकही ही व्यक्ती का बोलत नाही, याचा विचार करता करता अंतर्मुख होतात आणि न बोलता प्रश्न सुटतात. म्हणूनच मौन म्हणजे विरोध नाही तर मौन एक परीक्षण आहे.

© दीपा नारायण पुजारी

इचलकरंजी

9665669148

deepapujari57@gmail.com

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – उज्ज्वला केळकर/ सुहास रघुनाथ पंडित / मंजुषा मुळे/ गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
1

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ नात्यांची खरी किंमत – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – शीतल कुलकर्णी ☆

शीतल कुलकर्णी

🌸 जीवनरंग🌸

☆ नात्यांची खरी किंमत – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – शीतल कुलकर्णी 

ज्या बहिणीची राखी सर्वात स्वस्त होती… तिच्यासाठी भावाने घेतलेला निर्णय सगळ्यांच्या डोळ्यात पाणी आणणारा होता!

रक्षाबंधनाच्या दिवशी एका बहिणीने भावाला फक्त वीस रुपयांची राखी पाठवली होती…

पण त्या राखीच्या मागे दडलेली तिची वेदना कळताच भावाने जे केलं, ते पाहून संपूर्ण कुटुंबाला नात्यांची खरी किंमत समजली. 

साताऱ्याजवळच्या एका छोट्याशा गावातल्या जुन्या घराच्या ओसरीवर मंदा शांतपणे बसली होती.

अंगावरची साडी जुनी आणि अनेक ठिकाणी विरलेली होती. चेहऱ्यावर काळजीच्या रेषा होत्या आणि डोळ्यांत मात्र एकच आशा होती…

यंदा तरी भाऊ मला विसरणार नाही ना?

रक्षाबंधनाला फक्त दोन दिवस बाकी होते.

मंदाने घरातल्या जुन्या पेटीतून तीन रेशमी राख्या काढल्या. त्यासोबत थोडं कुंकू, अक्षता आणि वीस रुपयांची एक जुनी नोट ठेवली.

तिने ते सगळं एका साध्या पांढऱ्या लिफाफ्यात ठेवलं.

लिफाफा बंद करताना तिच्या ओठांवर हलकंसं हसू आलं.

“माझ्या भावाच्या मनगटावर माझी राखी पोहोचली, तरी पुरे…” 

तिला ठाऊक होतं की भावाच्या घरात आता पैशाची कमतरता नव्हती.

पण तिच्याकडे भावाला देण्यासाठी महागडं घड्याळ नव्हतं…

महागडी मिठाई नव्हती…

होता तो फक्त आपुलकीने बांधलेला एक रेशमी धागा आणि वीस रुपयांचा आशीर्वाद. 

तिकडे पुण्यात मंदाचा मोठा भाऊ माधव आपल्या प्रशस्त घरात रक्षाबंधनाची तयारी करत होता.

टेबलावर मोठमोठे पार्सल ठेवले होते.

नागपूरला राहणारी बहिण वंदनाने महागडी मिठाई आणि सुंदर घड्याळ पाठवलं होतं.

कोल्हापूरला राहणाऱ्या सविताने सुंदर साडी आणि महागडी राखी पाठवली होती.

तेवढ्यात माधवची पत्नी स्नेहा स्वयंपाकघरातून चहा घेऊन आली.

ती सहज म्हणाली,

“माधव, बाकी सगळ्या बहिणींच्या किती छान भेटवस्तू आल्या आहेत. पण मंदाताईंचा नेहमीसारखा साधा लिफाफा आलाय. त्यात फक्त राखी आणि वीस रुपये आहेत.”

माधवने काहीही उत्तर दिलं नाही.

त्याने तो लिफाफा अलगद हातात घेतला.

लिफाफ्यावर बहिणीची ओळखीची अक्षरं पाहताच त्याचे डोळे पाणावले. 

कारण त्याला माहीत होतं…

त्या वीस रुपयांची किंमत बाकीच्या सगळ्या भेटवस्तूंपेक्षा कितीतरी मोठी होती.

मंदाचं लग्न दहा वर्षांपूर्वी सांगली जवळच्या एका कुटुंबात झालं होतं.

सुरुवातीला संसार ठीक होता.

पण काही वर्षांतच तिच्या सासऱ्यांच्या व्यवसायात मोठं नुकसान झालं.

घरची परिस्थिती ढासळली.

नंतर घरातील मालमत्तेवरून भावांमध्ये भांडणं झाली आणि मंदाच्या नवऱ्याला घर सोडावं लागलं.

या सगळ्या धक्क्यांमुळे त्यांची मानसिक अवस्था बिघडली.

ते एका छोट्या किराणा दुकानात मिळेल ते काम करू लागले.

मंदाने मात्र परिस्थितीसमोर हार मानली नाही.

तिने मुलगा ओंकारला शिकवलं.

स्वतः घरकामं केली.

कधी शेतात मजुरी केली, कधी दुसऱ्यांच्या घरची भांडी घासली…

पण माहेरच्यांना आपली परिस्थिती सांगितली नाही.

कारण तिला भीती होती—

“माझ्यामुळे माझ्या भावावर ओझं पडू नये.” 

माधवला हे सगळं माहीत होतं.

पण गेल्या काही वर्षांत कामाच्या व्यापात त्याच्याकडूनही बहिणीकडे पुरेसं लक्ष गेलं नव्हतं.

आज त्या वीस रुपयांच्या नोटेने त्याला स्वतःचीच चूक जाणवून दिली.

त्याने स्नेहाकडे पाहिलं.

“स्नेहा… यावेळी रक्षाबंधन आपण इथे साजरं करणार नाही.”

“मग? ”

माधव म्हणाला,

“यावेळी आपण सगळे मंदाकडे जाणार. आणि तिला न सांगता जाणार.”

स्नेहा काही क्षण शांत राहिली.

“पण अचानक आपण गेलो तर ती आपली व्यवस्था करण्याच्या चिंतेत पडेल…”

माधव हळूच म्हणाला,

“आपल्यासाठी ती व्यवस्था करणार नाही… आपण तिच्यासाठी काहीतरी करणार आहोत.”

रक्षाबंधनाची सकाळ…

माधव, स्नेहा आणि त्यांचा मुलगा अथर्व साताऱ्यातील मंदाच्या गावात पोहोचले.

घरासमोर उभे राहिल्यावर माधव काही क्षण स्तब्ध झाला.

मंदा अंगणात बसून कपडे धुत होती.

अंगावर जुनी साडी होती.

केस विस्कटलेले होते.

चेहरा थकलेला होता.

भावाला पाहताच तिच्या हातातून कपडा खाली पडला.

“दादा… तुम्ही? ”

तिच्या आवाजात आनंदापेक्षा आश्चर्य जास्त होतं.

जणू तिला विश्वासच बसत नव्हता की तिचा भाऊ खरंच तिच्या दारात उभा आहे.

माधवने पुढे होऊन तिला मिठी मारली.

“हो गं वेड्या… यावेळी मला तुझ्याकडून राखी बांधून घ्यायची होती.”

मंदाच्या डोळ्यांत पाणी आलं.

“पण दादा, आधी सांगितलं असतंस तर घर नीट केलं असतं…”

माधव तिचं वाक्य पूर्ण होऊ न देता म्हणाला,

“मला तुझं घर बघायला नाही… माझी बहीण बघायला यायचं होतं.” 

स्नेहाने मंदाला बाजारात नेलं.

तिच्यासाठी नवीन साडी घेतली.

ओंकारसाठी नवीन कपडे घेतले.

घरासाठी महिनाभराचं किराणा, औषधं, चादरी, पडदे आणि आवश्यक सामान घेतलं.

मंदा वारंवार म्हणत होती,

“वहिनी, एवढं कशाला? ”

स्नेहा हसून म्हणाली,

“गप्प बस. आज तुझं काही ऐकणार नाही.”

कित्येक वर्षांनी त्या घरात पुन्हा चैतन्य आलं होतं. 

मंदाच्या डोळ्यांत आनंद होता…

पण माधवच्या लक्षात एक गोष्ट आली.

मंदा अधूनमधून छातीकडे हात नेत होती आणि थोडा वेळ शांत बसत होती.

“काय झालं गं? ”

“काही नाही दादा… थोडा थकवा आहे.”

ती हसली.

माधवने जास्त विचार केला नाही.

संध्याकाळ झाली.

मंदाने राखीची थाळी सजवली.

तिने माधवच्या कपाळावर कुंकू लावलं.

राखी हातात घेतली…

तेवढ्यात माधव म्हणाला,

“थांब जरा…”

मंदा आश्चर्याने त्याच्याकडे पाहू लागली.

“का? ”

माधव हसला.

“तुझ्या दोन्ही बहिणी अजून आलेल्या नाहीत.”

मंदाला काहीच कळेना.

तेवढ्यात बाहेर गाडी थांबण्याचा आवाज आला. 

दार उघडलं…

आणि समोर वंदना आणि सविता आपल्या कुटुंबासह उभ्या होत्या.

मंदाच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. 

तिने धावत जाऊन दोन्ही बहिणींना मिठी मारली.

काही दिवसांपूर्वी माधवने बहिणींना म्हटलं होतं,

“आपण दरवर्षी फिरायला जातो. यावेळी कुठेतरी तीर्थयात्रेला जाऊया.”

तेव्हा तोच हसून म्हणाला होता,

“यावेळी आपली चारधाम यात्रा म्हणजे आपल्या मंदाचं घर.”

दोन्ही बहिणींनी त्याच क्षणी होकार दिला.

त्यांनी ठरवलं होतं—

मंदाला पैशांची मदत करायचीच, पण त्याहून आधी तिला हे जाणवून द्यायचं की ती एकटी नाही. 

त्या रात्री सगळे जवळच्या हॉटेलमध्ये जेवायला गेले.

मंदा फारसं बोलत नव्हती.

ती फक्त सगळ्यांकडे पाहत होती.

कधी भावाकडे…

कधी बहिणींकडे…

कधी आपल्या मुलाकडे…

आणि पुन्हा तिच्या डोळ्यांत पाणी येत होतं. 

पण यावेळी त्या अश्रूंमध्ये दुःख नव्हतं.

ते अश्रू होते—“माझी माणसं अजून माझीच आहेत” या समाधानाचे. 

रात्री सगळे घराच्या अंगणात गाद्या टाकून झोपले.

जुन्या आठवणी निघाल्या.

सगळे हसत होते.

मंदा मात्र शांतपणे माधवच्या खांद्यावर डोकं ठेवून पडली होती.

“दादा…”

“काय गं? ”

“आज खूप वर्षांनी मला माझं माहेर मिळाल्यासारखं वाटतंय.”

माधवने तिच्या डोक्यावरून हात फिरवला.

“माहेर कधी संपत नसतं गं… फक्त आपण एकमेकांपासून दूर जातो.” 

मंदाने डोळे मिटले.

तिच्या चेहऱ्यावर समाधान होतं.

रात्री बराच वेळ गप्पा सुरू होत्या.

अचानक माधवला जाणवलं की मंदाचा हात खूप थंड झाला आहे.

“मंदा…? ”

त्याने तिला हलवलं.

“मंदा, उठ गं…”

काहीच प्रतिसाद नव्हता.

सगळे घाबरून उठले.

दिवा लावला.

पण…

मंदाचे डोळे कायमचे मिटले होते. 

तिच्या चेहऱ्यावर मात्र एक शांत, समाधानाचं हास्य होतं.

सगळ्यांच्या लक्षात आलं की ती काही महिन्यांपासून आजारी होती.

पण तिने कुणालाही सांगितलं नव्हतं.

कदाचित तिला औषधांपेक्षा एका गोष्टीची जास्त गरज होती…

आपल्या माणसांची.

आणि कदाचित म्हणूनच ती त्या दिवसापर्यंत थांबली होती.

ज्या दिवशी तिची राखी भावाच्या मनगटावर बांधली जाणार होती…

ज्या दिवशी तिच्या अंगणात पुन्हा बहिणींचं हसू येणार होतं…

ज्या दिवशी तिला पुन्हा एकदा “माझं माहेर माझ्यासोबत आहे” असं वाटणार होतं. 

 

मंदा या जगातून निघून गेली…

पण यावेळी ती एकटी गेली नाही.

तिच्या शेवटच्या क्षणी तिच्या आजूबाजूला तिची माणसं होती.

तिच्या डोक्यावर भावाचा हात होता.

आणि तिच्या चेहऱ्यावर समाधान होतं. 

कधी कधी महागड्या भेटवस्तूंपेक्षा एखाद्या माणसाची वेळ, त्याचा हात आणि “मी आहे ना” हे चार शब्द आयुष्यभर लक्षात राहतात.

म्हणूनच…

नाती फक्त सणाच्या दिवशी आठवू नका.

कदाचित कुणीतरी तुमच्या एका भेटीची वाट पाहत असेल… आणि तुम्हाला त्याची कल्पनाही नसेल. 

 

लेखक : अज्ञात

प्रस्तुती : शीतल कुलकर्णी

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “मैत्रीतली लक्ष्मणरेखा” ☆ श्री मंगेश मधुकर ☆

श्री मंगेश मधुकर

? मनमंजुषेतून ?

☆ “मैत्रीतली लक्ष्मणरेखा…” ☆ श्री मंगेश मधुकर

झालं असं की,

गाडी गेटसमोर आल्यावर दोन-तीनवेळा हॉर्न वाजवूनही सिक्युरिटीनं दार उघडलं नाही.साहेब प्रचंड चिडले.ड्रायव्हर गाडीतून उतरणार इतक्यात घाईघाईनं दार उघडलं.गाडी आत गेली.काही वेळातच साहेबांनी बोलवल्याचा निरोप आला.गार्डला दरदरून घाम फुटला.ड्युटीच्या पहिल्याच दिवसाची सुरवात वाईट झाली. 

“दार उघडायला उशीर का झाला”साहेब. 

“माफ करा.पुन्हा असं होणार नाही”गार्डनं हात जोडले तेव्हा साहेबांनी केबिनमधल्या इतरांना बाहेर जायला सांगितलं. 

“इथं कधीपासून कामाला आहे? ”साहेब 

“आजचा पहिलाच दिवस”

“बस.चहा घेणार”साहेबांनी विचारल्यावर गार्डनं नको म्हणाला.

“चहा का नको.”

“इथं नको.आता ड्युटीवर आहे”

“ड्यूटी संपल्यावर भेट”निरोप घेऊन गार्ड केबिनच्या बाहेर पडला.ऑफिसमधल्या नजरा टाळत गार्ड गेटवर आला.

—-

संध्याकाळी टपरीवर चहा घेताना साहेबांनी विचारलं “भल्या माणसा कुठे होतास.तीन वर्षांनी भेटतोयेस.”

“माझ्या आयुष्यात बऱ्याच घडामोडी झाल्या त्यामुळे कोणाच्याच कॉटॅक्टमध्ये नव्हतो.नंबर पण बदलला.”

“एकदम सिक्युरिटी लाइन मध्ये..”

“अचानक कंपनी बंद पडली.काहीतरी हातपाय चलवावे लागणार होते.म्हणून मग…”

“मी काही मदत..”

“नाही नको.आता व्यवस्थित चाललयं.थँक्स.”

“ऑफिसमध्ये चहा नको का म्हणालास”

“ते बरोबर नव्हतं”

“म्हणजे, ”

“तिथं तू मालक मी कामगार”

“आणि इथं?? ”

“मित्र तेही लहानपणापासूनचे”

“तरीही असं बोलतोस.चहा घेतला असता तर आभाळ कोसळलं नसतं.मैत्री अशी ठिकाणानुसार बदलत नाही.”

“खरंय!! पण परिस्थितीनुसार वागावं लागतं.आपल्या मैत्रीतली ‘लक्ष्मणरेखा’ मला ओलांडायची नव्हती.”

“एकदम असं का बोलतोयेस.”

“आपल्यातल्या अंतराची जाणीव आणि मर्यादाही मला माहितीये”

“पैसा, हुद्दा, प्रतिष्ठा, ईगो या गोष्टी आपल्यात कधीच नव्हत्या.”

“आताही नाहीत.हेच बघ ना माझ्यासोबत टपरीवर चहा घेतोयेस यातच सगळं काही आलं.तू बदलला नाहीस.”

“आणि बदलणारही नाही.”साहेब.

“करेक्ट!! ”

“तरीही तू असा विचार करतोस.आपली मैत्री जगाला कळली तरी काय फरक पडणार आहे”

“मलाही तेच म्हणायचयं.”

“काय? ”

“आपली ‘मैत्री’ जगाला दाखवायचीच कशाला?? लोकांना विनाकारण चर्चेसाठी विषय द्यायची गरज नाही.”

“हे पण बरोबर आहे, आणि आता भेटत राहू.” चियर्स म्हणत दोघांनी चहाचे ग्लास भिडवले.तेव्हा एफएम वर मन्नादा आणि किशोरदा गात होते “ये दोस्ती, हम नही तोंडेगे…”

— 

पैसा, हुद्दा, प्रतिष्ठा, ईगो असल्या गोष्टींना मैत्रीत स्थान नसलं तरी एक लक्ष्मणरेखा मात्र असते.

 

© श्री मंगेश मधुकर

मो. 98228 50034

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ”हा EGO नाही तर SELF RESPECT…” ☆ संध्या बेडेकर ☆

संध्या बेडेकर

? मनमंजुषेतून ?

☆ “हा EGO नाही तर SELF RESPECT... ☆ संध्या बेडेकर ☆

 – – कधी कधी शक्ति प्रदर्शन करणं आवश्यक असत.

आज कुठून सूर्य उगवला माहित नाही. रोज शांतपणे सुरू होणारा दिवस, आज जरा विचित्रच सुरू झाला. रात्रभर अस्वस्थच होते मी.स्वप्न पण विचित्रच पडली. सारखी मारामारी दिसत होती. द्रोण, मिसाइल, सायरन किती ते आवाज! डोक भणभणत होत. रोज सकाळी देवाला नमस्कार करत आणि आजची सकाळ बघायला मिळाली, त्याबद्दल देवाचे आभार मानत, भूमीला वंदन करत उठणारी मी, आज वर्षानुवर्ष चालणारी परिपाटी पार विसरून गेले.

मन अस्वस्थ, अशांत, काहीतरी बिघडलंय, काहीतरी वेगळ घडलय, जे मन विचलित करणार, तस काहीतरी वेगळच. 

 भांडण, मारामारी, ठोकाठोकी आज स्वप्नात हेच सगळं बघीतल.आणि TV वर पण जोरजोरात तेच सांगण चालू होत.

आज काही खर नाही.विचाराची दिशा चूकलीच आहे. आज त्याच संदर्भात जुन्या घटना आठवल्या.

मनाने एकदम भरारी घेतली. मन तर वाटच बघत असत. सुपरसोनिक स्पीड ने भांडणाच्या सर्व घटना बरोबर शोधून काढल्या. त्यावर बरोबर वार केला. 

खरतर भांडाभांडी करायचा माझा स्वभाव नाही. पटत नाही अस जेंव्हा कधी माझ्या लक्षात येत, तेंव्हा मी रस्ता बदलते.हा सरळ सोपा मार्ग मी निवडला आहे. पण जेंव्हा हे लक्षात येत की आपल्या शांतिपूर्ण वागण्याला समोरचा granted घेतोय, तो आपल्याला मूर्ख समजतोय. बेवकूफ समजतोय, तेंव्हा मात्र दणका दयावाच लागतो. दणका मात्र वेळ बघून, जोरात बसेल, चार लोकांच्या लक्षात येईल असा देते.

 जोर का झटका जोर से ही लगे असाच वार करायचा.

या विचारा बरोबर हे जे चाललय, ते चूक की बरोबर याचाही गोंधळ मनात चालूच असतो. त्यांना दणका देताना, आपल पण नुकसान होतच असत ना.

दणका द्यायचे दोन फायदे होतात. 

 एकतर आपल्याला आपली शक्ति कळते.वार करताना काय बरोबर? कुठे चूक झाली? हे कळत. म्हणजे पूढे जर अशी वेळ आलीच, तर जास्त पावरफुल वार करता येईल. लगेच पूढची strategy तयार होते.

आणि दुसऱ्यालाही आपण काय आहोत? हे समजत. बाकीचे चार लोक आपल्या आप सावध होतात. त्यांनाही आपल्या शक्तिची झलक दिसते. आपल्याबद्दल त्यांचे अनुमान/ Impression ते ठीकठाक करतात.

उदया पुन्हा खोड्या काढायच्या आधी, पंगा घ्यायच्या आधी सर्व विचार करतील. 

त्यामुळे भांडण नेहमी चूकच असत अस नाही.असा आज मी शोध लावलाय.

लहानपणी शिकवल होत भांडायच नाही. आता गेले ते दिवस. एका गालावर मारल तर दुसरा गाल पूढे करायचे दिवस गेले. 

 कधी कधी शक्ति प्रदर्शन करणही आवश्यक असतच. आपण जपून ठेवलेले हथियार वेळ पडली तर काम चोख बजावतात की नाही त्यांची testng पण होऊन जाते.

भांडणात फायदा तसा कोणाचाच नसतो. भांडणानंतरही नाॅर्मल व्हायला वेळ लगतोच.

 अरे!! त्यावेळेस मला अस बोलायला हव होत, अस म्हणायला हव होत. अस करायला हव होत. चर्चांचा दौर सुरू होतो.जो तो आपल्या बुद्धीनुसार, स्वभावानुसार, आपला फायदा बघून आपले विचार मांडत असतो. 

 हे सर्व मनात येत राहत. बरेच दिवस त्यावर विचार होत राहतो. हे अस किती दिवस चालेल? हे माहित नसत. एकदा मनसोक्त ठोकून झाल की लवकरात लवकर भांडण थांबविण आवश्यक असत. कधी कधी लोक दुसर्यांचा चष्मा घालून त्यांचा आधार घेऊन भांडतात.इंग्रजीत भांडतात.त्यांचा बहुतेक असा समज असतो की अस केल्याने समोरच्यावर जास्त दबाव पडेल. दबाव आणि प्रभावाचा माझ्यावर काडीचाही असर पडत नाही. 

भांडताना केंव्हा थांबायच? ते मात्र वेळेवर कळलच पाहिजे. आपल्या भांडणाची मजा घेणारे कोण? किती जण आहेत? आपल्याला उक्सवणारे किती आहेत? आपल्याला समोर ढकलून मागच्या मागे पळून जाणारे कोण? किती? शुभचिंतक किती? हेही समजत. तसे शुभचिंतकांची संख्या खूप नसतेच.या अशा लोकांच्या तावडीत जायच नाही.

 There are lot of jealous people with friendly faces around us.We must always remember this truth.

त्यांच्या मनोरंजनाचे कारण आपण व्हायच नाही. ते काय फ्री फूकट मध्ये मजा घेतात.नुक़सान तर आपलही होतय ना. आपण आपली किती energy, वेळ, पैसा, मनस्वास्थ्य? यावर खर्च करायच, हे आपल्यालाच ठरवायच असत. त्यामुळे वेळेवर, Cease fire करण जमल पाहिजे. 

लोकांना काय वाटेल ते वाटू दे. काही समजो वा न समजो लोक काय दोन्ही बाजूने बोलतात.

 If you want to make wrong decision, ask everyone.

 Cease fire मी घाबरले म्हणून झाला नाही, केलाय.. माझा उद्देश्य पूर्ण झाला होता. म्हणून केलाय. मग पूढे होणारे नुकसान वाचविण्यातच हुशारी होती.एवढ समजण्या इतपत आपण हुशार आहोतच. आपल्याला आपली जबाबदारी, कर्तव्य, माझ, माझ्या कुटुंबाच हित समजण्या एवढी हुशार मी नक्कीच आहे. फूकटच काही मिळतय म्हणून लाळघोटेपणा करण, जमत नाही मला. हा माझा

 EGO नाही SELF RESPECT आहे.

 सकाळी विचलीत असलेल मन हळुहळु शांत झाल. जे झाल ते चांगल झाल. आणि लवकर थांबल, तेही चांगलच झाल.

म्हणतात ना,…

 Revenge is just waste of Time, Skip people.

हे जरी खर असल तरी कधी कधी छान दणका देण आवश्यक असतच.

शक्ति प्रदर्शन करण ही आवश्यक आहे.

खूप soft राहिल तर लोक मूर्ख समजतात.तेंव्हा आपली strong personality दाखविणेही आवश्यक असते.

 छेडोगे तो, छोडेंगे नही, थोडा नुकसान सह लेंगे, लेकिन झुंकेगे तो बिल्कुलही नही.

हा मेसेज देणे आवश्यक असत…

At the same time…

If you treat me good, I will treat you better. 

हेही सांगणे/ दाखवणे आवश्यक असते. 

कोणाला सांभाळायच? आणि कोणापासून सांभाळून रहायच? हे ही समजलच पाहिजे. नाही का?

© संध्या बेडेकर 

वारजे, पुणे.  

7507340231

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ CPR…अर्धवट ज्ञान धोक्याचे! ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

CPR…अर्धवट ज्ञान धोक्याचे! ☆ श्री संभाजी बबन गायके 

दुस-याचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करणे, हे नेहमीच कौतुकास्पद आहे. परंतु अर्धवट वैद्यकीय ज्ञान, गैरसमज यांमुळे एखाद्या व्यक्तीची जीव वाचवला जाण्याची शक्यता बरीच कमी होऊ शकते!

आपल्याकडे अपघातात सापडलेल्या व्यक्तीला पाणी पाजण्याची रीत आहे. आणि अशा व्यक्तीला यावेळी पाणी पिण्याची प्रचंड इच्छा होते, हेही खरे आहे. या व्यक्तीला जर मांडीवर घेतले तर हनुवटी त्याच्या गळयाच्या खाली टेकते आणि त्यामुळे त्याचा श्वासमार्ग काहीसा अवरुद्ध होतो…अशावेळी त्याला पाणी पाजले तर ते पाणी पोटात न जाता फुप्फुसात जाण्याची आणि त्यामुळे श्वास घेण्यास त्रास होण्याची खूप शक्यता असते. यामुळे त्या व्यक्तीला उपायापेक्षा अपायच होऊ शकतो. 

हल्ली हृदयविकाराचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढलेले आहे. आणि कधीही, कुणालाही, कोणत्याही ठिकाणी, कोणत्याही वेळी याला सामोरे जावे लागू शकते. हृदयविकाराच्या झटक्याचे एकापेक्षा अधिक प्रकार असतात. Heart Attack आणि Cardiac Arrest यांमध्ये फरक असतो. 

Heart Attack (Myocardial Infarction): A plumbing problem where blood flow to a part of the heart muscle is blocked. The person is usually conscious, breathing, and has a pulse. CPR is not performed in this state.:- हृदयाच्या स्नायूंना होणा-या रक्तपुरवठ्यामध्ये काही अडथळा येतो. असा रुग्ण सर्वसाधारणपणे शुद्धीवर असतो, श्वास सुरु असतो, त्याच्या श्वासांची नाडी लागते. या प्रकारात सीपीआर दिला जात नाही.

Cardiac Arrest: An electrical problem where the heart abruptly stops beating and pumping blood. The person loses consciousness, stops breathing normally (or only gasps), and has no pulse. This is when CPR is required.:- या प्रकारात हृदयाचे काम अचानकपणे थांबते आणि रक्त आत घेण्याची आणि बाहेर टाकण्याची प्रक्रिया थंडावते. रुग्ण बेशुद्ध होतो, नियमित श्वास घेत नाही, दीर्घ उसासे टाकतो आणि त्याची श्वासाची नाडी लागत नाही. या प्रकारात cpr दिला जातो. 

गरज नसताना cpr दिला जात असताना, cpr देणारी व्यक्ती प्रशिक्षित नसल्याने एका महिलेच्या बरगड्या मोडल्याचा प्रकार नुकताच घडला, त्याची बातमी आपण वाचली असेलच! यात cpr देणा-याचा हेतू चांगलाच होता…मात्र परिणाम चुकीचा झाला!

वरील माहिती इंटरनेटवरून घेतली असून त्याचे स्वैर भाषांतर केले आहे. आणि हे १०० टक्के बरोबर असेल, असे अजिबात नाही. मात्र सर्वसामान्य माहिती द्यावी, म्हणून दिली आहे. 

मुख्य मुद्दा हाच आहे की, cpr अर्थात cardiopulmonary resuscitation (हृदय व फुफ्फुसांचे पुनरुज्जीवन) कसे द्यावे. भारतातील केवळ २ टक्के लोकांना याचे प्रशिक्षण मिळालेले आहे!

महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने याबाबत एक माहितीपत्रक प्रसिद्ध केले आहे. ते प्रत्येकाने एकदा तरी नजरेखालून घालावे! मोठी माणसे आणि लहान मुले यांना cpr द्यायचा झाल्यास स्वतंत्र सूचना आहेत!

आणखी एक गोष्ट, cpr देताना छातीवर दाब द्यावाच लागतो, या दाबामुळे रुग्णाच्या बरगड्या तुटू शकतात! आणि वयस्कर व्यक्ती ज्यांचे हाडे वयोमानामुळे ठिसूळ झालेली आहेत तसेच लहान मुले यांच्यात हे प्रमाण अधिक होऊ शकते. काही अज्ञानी लोक डॉक्टरांनी जोरात cpr दिला आणि त्यामुळे रुग्णाची हाडे तुटली आणि त्यामुळे त्याचा मृत्यू ओढवला…असे समजतात! याला काही अर्थ नाही. उलट जीव वाचवण्याचा निकराचा प्रयत्न करीत असताना बरगड्या मोडल्या तरी cpr थांबवून चालत नाही..अन्यथा रुग्णाची वाचवले जाण्याची शक्यता संपून जाऊ शकते!

 शासनाने प्रसिद्ध केलेली cpr देण्याची पद्धत सांगणारी pdf इंटरनेट वर उपलब्ध आहे. मी whatsapp वर पाठवू शकतो.

 अधिकृत माहितीसाठी प्रत्येकाने शासकीय अधिकृत लेखी साहित्य पहावे. या लेखावर विसंबून राहू नये, ही नम्र विनंती.

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ कर्णाचं गुप्तदान… ☆ डॉ मकरंद पिंपुटकर ☆

डॉ मकरंद पिंपुटकर

? इंद्रधनुष्य ?

☆ कर्णाचं गुप्तदान…  ☆ डॉ मकरंद पिंपुटकर 

अर्जुन एकदा श्रीकृष्णाला विचारता होतो – “कृष्णा, कर्णाप्रमाणेच मीसुद्धा खूप दान करतो, मग लोकं कर्णाचेच दानशूर म्हणून का गोडवे गातात? “

कृष्ण अर्जुनाला एका टेकडीच्या पायथ्याशी वसलेल्या एका गावात घेऊन जातो. कृष्ण आपल्या मंत्रशक्तीने त्या टेकडीचे सोन्याच्या ढीगात रूपांतर करतो आणि अर्जुनाला सांगतो, “हे सोनं या गावातल्यांना वाटून टाक.”

अर्जुन गावात दवंडी पिटवतो व दुसऱ्या दिवशी सकाळपासून सर्वांना सोन्याचं दान स्वीकारायला बोलावतो. दिवसभर अर्जुन दान वाटतो आणि प्रश्नार्थक मुद्रेने कृष्णाकडे पाहतो.

कृष्ण काही उत्तर न देता कर्णाकडे जातो व त्यालाही एका टेकडीएवढ्या सोन्याचं दुसऱ्या एका गावात वाटप करायला सांगतो. हा निरोप मिळताक्षणी कर्ण त्या गावच्या मुखियाकडे जातो, व सांगतो की तुमच्या गावाच्या वेशीवर सोनं ठेवलं आहे, तुम्ही तुमच्या गावकऱ्यांत वाटून टाका.

निरोप दिल्यावर क्षणभरही न थांबता कर्ण तिथून निघून जातो. अर्जुन हे सर्व पहात असतो आणि ही निरपेक्ष वृत्ती बघून तो मनात खजिल होतो. कृष्ण त्याला सांगतो, “तू स्वत: उभा राहून दान वाटत होतास तेव्हा तुझ्या मनात सुक्ष्म अहंकार होता – हे दान *मी* देत आहे, *मी* गावकऱ्यांना मदत करत आहे, *माझं* कौतुक व्हावं. कर्णाचं तसं नाही. त्याच्या डाव्या हातानं दिलेलं दान उजव्या हाताला कळतही नाही, या त्याच्या प्रसिद्धीच्या मागे न धावण्यातच त्याचं श्रेष्ठत्व आहे.”

अर्जुनाला आणखी काही सांगायची गरज नव्हती.

— — — —

करोना काळातली ही कथा. गुजरातमधील सुरत जिल्ह्यातील रांदेर गावाजवळील गोराट नावाचं छोटंसं खेडं! रेड झोनमधील करोना प्रभावित क्षेत्र. सकाळी दोन तास किराणा भाजीपाला विक्रीला परवानगी असण्याच्या वेळात एक छोटासा टेंपो खेड्याच्या बाजाराच्या जागी येऊन उभा राहिला. टेंपोच्या सर्व बाजूंच्या फलकावर – बॅनर्सवर “गरजूंसाठी प्रत्येकी एक किलो पीठाचं वाटप” असं लिहीलेलं.

ना लाऊडस्पीकर, ना गाजावाजा, ना फोटोग्राफरची फौज. टेंपोचा ड्रायव्हर गाडी थांबवून मागच्या बाजूला येऊन हातात एक किलो पीठाची पिशवी घेऊन उभा राहिलेला. तोही डोक्यावर टोपी घातलेला आणि मास्क वगैरे जामानिम्याने चेहरा जवळपास दिसतच नव्हता.

खरंच गरजू जे होते, ज्यांना एक किलो पीठाचीही महती होती असे पाच पन्नास जण येत गेले, तो ड्रायव्हर प्रत्येकाला एक एक किलो पीठाची पिशवी देत होता, अदबीने मनापासून नमस्कार करत होता, थोडे धीर देणारे दोन शब्द बोलत होता आणि मग रांगेतील पुढच्या माणसाकडे वळत होता.

— — — —

हनुमान मंदिराजवळच्या मासीने (मावशी) एक किलो पीठ घेतलं होतं. लॉकडाऊनमुळे तिचं टिकल्या बांगड्या विकण्याचं छोटेखानी दुकान गेला महिनाभर बंदच होतं. जवळची पुंजी संपत आलेली. थोडं उधार उसनवार करून कसंबसं ती चिल्ल्यापिल्यांना दोन घास खाऊ घालत होती.

आज असलेल्या तुटपुंज्या पैशातून तिनं थोडी भाजी, थोडे तांदुळ, थोडी डाळ घेतली होती. आज गव्हाचं पीठ मिळालं होतं, पोराबाळांना एक दोन दिवस तरी पोळी खायला मिळणार होती.

घरी आली, कणिक मळायला तिनं पीठाची पिशवी फोडली, पीठ काढताना पीठात एक प्लॅस्टिकची पिशवी तिच्या हाताला लागली. ती पिशवी तिनं झटकून उघडली, पाहिलं तर एक नोटांचं छोटं पुडकं त्या पिशवीत होतं. तिच्या छोट्या कुटुंबाची महिन्या दोन महिन्याची डाळ तांदुळाची सोय करेल इतके पैसे त्यात होते.

मासीने ते पीठ तसंच ठेवलं. कशीबशी दाराला बाहेरून कडी घातली आणि ती बाजारपेठेतल्या त्या टेंपोवाल्याला शोधायला; त्याला भेटायला; त्याचे आभार मानायला धावतच निघाली.

तास दोन तास वाटप करून, “इदं न मम” म्हणत, आपलं काम चालू ठेवण्यासाठी टेंपो जसा आला तसाच गुमनामपणे पुढच्या गावाला निघून गेला होता आणि बाजारपेठेत त्याच्याकडून पीठ घेतलेली मासी, रसिकाबेन, चंपककाका, अस्लम, राघाभाई, करसनकाका त्याला शोधत होते आणि तो गेला त्या वाटेकडे बघत हात जोडून नमस्कार करत त्याचे आभार मानत होते.

— — आजही गुप्तदान करणारे दानशूर कर्ण डाव्या हाताने दिलेलं दान उजव्या हाताला कळू देत नाहीयेत.

डॉ. मकरंद पिंपुटकर 

 चिंचवड

मो ८६९८०५३२१५   

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ ‘मी मस्त आहे…’ – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री ब्रह्मानंद पै ☆

श्री ब्रह्मानंद पै

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ ‘मी मस्त आहे…’ – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री ब्रह्मानंद पै 

वय झाले अजून मस्ती गेली नाही

विचार धावतात पण शरीर साथ देत नाही

कळते आहे पण वळत नाही

कोणावर विश्वास ठेवायचा तेच समजत नाही

तरी पण मी मस्त आहे….

  

काय होतंय सांगता येत नाही

दुखतात गुढगे सांगायचे नाही

कुणाकडे जाताही येत नाही

सावकाश चालायचे हेच आता उरले

तरी पण मी मस्त आहे….

  

थकले शरीर जरी

नजर अजून शाबूत आहे

थकल्या जीवाला

थोडी उभारी देत आहे

तरी पण मी मस्त आहे….

 

आताशा  मोजकेच दात तासून 

त्यावर टोप्या (cap) घातल्यात

तेव्हा कुठे दुःख थांबले

कुस्करून खाल्ले

तेव्हा पचायला लागले

तरी पण मी मस्त आहे….

 

वाचायला घेतले धुरकट दिसते

चष्मा लावला तर पाणी सुटते

डोळे पुसत वाचण्यापेक्षा

न वाचलेले परवडते

तरी पण मी मस्त आहे….

 

लिहायला घेतले तर हात कापतात

शब्दांवरच्या रेषा सरळ कुठे येतात?

साधी स्वाक्षरी पण धड येत नाही

चेक परत का येतात तेच समजत नाही

तरी पण मी मस्त आहे….

 

उलटा बनियन तर नेहमीच असतो

तरी बरे तो आत झाकला जातो

घरातले हसतातच

तरी पण मी मस्त आहे….

 

कानात हुंकार वाजत असतात

शब्द अस्पष्ट ऐकू येतात

अनुभवाने समजून  घेतो

आणि मगच उत्तर देतो

तरी पण मी मस्त आहे….

 

वाचयला घेतले तरी लक्ष लागत नाही

वाचलेलेसुद्धा काही लक्षात रहात नाही

मित्रांशिवाय कुणाला काही सांगत नाही

समदुःखाची कथा बाकीच्यांना पटणार नाही

तरी पण मी मस्त आहे….

 

बरेच आयुष्य जगून घेतले

अजून थोडे बाकी आहे

उरलेले मात्र सुखात जावे

एवढीच इच्छा बाकी आहे

तरी पण मी मस्त आहे…

 

संसाराचे सारे पाश

आता पूर्ण सोडायचे आहेत

उरलेली पुंजी संपेपर्यंत

आनंदी जगायचे आहे

तरी पण मी मस्त आहे….

 

आपल्याच धुंदीत जगलो आहे

पाहिजे ते मिळवले आहे

उपभोगून आयुष्य सारे

गात्रे शिथिल होत आहेत

तरी पण मी मस्त आहे….

 

आयुष्यात ज्यांनी साथ दिली

काहींनी मध्येच साथ सोडली

कोणाचेच काही अडलं नाही

तरी सर्वांचा मी आभारी आहे

आणि मी मस्त आहे….

 

भार कोणावर टाकायचा नाही

झटपट मात्र बोलावणे यावे

इतरांना हवेहवे वाटताना

आपण निसर्गात विलीन व्हावे

तरी पण मी मस्त आहे….

          आणि  हे देवा  ,

तिथे पण मी मस्त रहावे….

लेखक: अज्ञात 

प्रस्तुती: श्री. ब्रह्मानंद पै

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ “इस्त्रायल हमास हिजबुल्लाह” – लेखक : श्री रोहन अंबिके ☆ परिचय – श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆

श्री हर्षल सुरेश भानुशाली

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ “इस्त्रायल हमास हिजबुल्लाह” – लेखक : श्री रोहन अंबिके ☆ परिचय –  श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆

पुस्तक : इस्रायल हमास हिजबुल्ला 

 – – – एक अविरत संघर्ष

लेखक : रोहन अंबिके

पृष्ठः २००

मूल्य: ३००₹ 

आजच्या काळातील सर्वात धोकादायक आणि सतत चालू असलेल्या संघर्षांपैकी एक म्हणून इस्त्रायल-हमास-हिजबुल्लाह संघर्षाकडे पाहता येईल. हा संघर्ष खोलवर रुजलेल्या ऐतिहासिक शत्रुत्व, विचारधारा आणि उदयास येत असलेल्या जागतिक युतींमुळे प्रभावित झाला आहे.

‘इस्रायल-हमास-हिजबुल्लाह’ हे पुस्तक या संघर्षाची सुरुवात, निर्णायक लढाया आणि त्याचे दूरगामी परिणाम यांचे सखोल विश्लेषण करते.

हे पुस्तक ऑक्टोबर २०२३ च्या युद्धाचे परीक्षण करते. हा एक असा निर्णायक टप्पा होता ज्याने या संघर्षाला एक नवीन दिशा दिली. त्याचबरोबर समकालीन युद्धतंत्रात सोशल मीडियाच्या वाढत्या भूमिकेचाही आढावा घेते. जिथे करण्यात येणारा प्रचार आणि दिशाभूल करणारी माहिती जागतिक कथानकांना आकार देत असतात. हे पुस्तक भारताच्या बदलत्या भूमिकेवरही प्रकाश टाकते, ज्यात ऐतिहासिक संबंधांपासून ते अधिकच ध्रुवीकरण झालेल्या जगातील राजनैतिक उपक्रमांपर्यंतच्या बाबींचा समावेश आहे.

सखोल संशोधन केलेले आणि सूक्ष्म बारकावे असलेले ‘इस्त्रायल-हमास-हिजबुल्लाह’ हे पुस्तक केवळ बातम्यांच्या मथळ्यांपुरते मर्यादित राहत नाही. तर ते जागतिक भू-राजकारणाला सतत आकार देणाऱ्या या युद्धावर अधिक अभ्यासपूर्ण दृष्टिक्षेप टाकणारे ठरले आहे.

आजच्या काळातील सर्वात धोकादायक आणि सतत चालू असलेल्या संघर्षांपैकी एक म्हणून इस्त्रायल-हमास-हिजबुल्लाह संघर्षाकडे पाहता येईल. हा संघर्ष खोलवर रुजलेल्या ऐतिहासिक शत्रुत्व, विचारधारा आणि उदयास येत असलेल्या जागतिक युतींमुळे प्रभावित झाला आहे.

पुस्तकाचे मुख्य विषय व वैशिष्ट्ये

इस्रायल या ज्यू राष्ट्राची निर्मिती, पॅलेस्टाईनचा प्रश्न आणि १९४८ पासून सुरू झालेल्या अरब-इस्रायल युद्धांचा ऐतिहासिक आढावा यात घेतला आहे.

हमास (गाझा पट्टी): हमासची स्थापना, त्याची विचारधारा, पॅलेस्टाईन मुक्ती चळवळीतील त्याची भूमिका आणि इस्रायलविरोधी सशस्त्र संघर्ष यावर प्रकाश टाकला आहे.

हिजबुल्लाह (लेबनॉन): शिया मुस्लिम संघटना म्हणून लेबनॉनमध्ये हिजबुल्लाहचा झालेला विस्तार, इराणकडून मिळणारा पाठिंबा आणि इस्रायलसोबतचे उत्तर सीमेवरील युद्ध याचे विश्लेषण यात आढळते.

इराणची भूमिका: या संपूर्ण संघर्षामागे ‘अॅक्सिस ऑफ रेझिस्टन्स’ (Axis of Resistance) च्या माध्यमातून इराण कशा प्रकारे हमास आणि हिजबुल्लाहला मदत करतो, हे पुस्तकात स्पष्ट केले आहे.

७ ऑक्टोबर २०२३ चे युद्ध आणि परिणाम: हमासने इस्रायलवर केलेला अभूतपूर्व हल्ला, त्यानंतर इस्रायलने गाझामध्ये सुरू केलेली लष्करी कारवाई आणि या संघर्षाचे आंतरराष्ट्रीय राजकारणावर झालेले दूरगामी परिणाम याचे ताजे विश्लेषण पुस्तकात समाविष्ट आहे.

तटस्थ मांडणी: लेखकाने कोणत्याही एका बाजूचा पूर्वग्रह न ठेवता भौगोलिक, धार्मिक, राजकीय आणि लष्करी दृष्टीकोनातून या संघर्षाचे तटस्थपणे मूल्यमापन केले आहे.

मध्य पूर्वेतील हे युद्ध फक्त दोन देशांपुरते मर्यादित नसून जागतिक अर्थकारण आणि महासत्तांच्या राजकारणाशी कसे जोडलेले आहे, हे समजून घेण्यासाठी रोहन अंबिके यांचे हे पुस्तक अत्यंत उपयुक्त आणि वाचनीय आहे.

अनुक्रमणिका :: 

१. ज्यू ओळखः इतिहास आणि आंतरधर्मीय संबंध

२. संघर्षाची पार्श्वभूमी

३. पूर्वइतिहास

४. संघर्षाची धगः लेबॅनॉन आणि गाझा युद्धे

५. ७ ऑक्टोबर २०२३

६. हमास आणि हिजबुल्लाह

७. इस्रायलचा दृष्टीकोन

८. आधुनिक संघर्षांमध्ये समाज माध्यमांची भूमिका

९. आंतरराष्ट्रीय सहभाग आणि शेजारी देश

१०. भारताचा दृष्टिकोनः मुत्सद्दीपणा आणि शांतता प्रयत्न

११. तंत्रज्ञान आणि युद्धः ड्रोन, सायबर वॉरफेअर आणि पाळत ठेवणे

१२. शांतता आणि भविष्यातील परिस्थितीची संभावना

१३. शेवट की सुरुवात?

 

परिचय : श्री हर्षल सुरेश भानुशाली

पालघर 

मो. 9619800030

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

ई-अभिव्यक्ति संवाद ☆ शिक्षाविद्, लोक-विज्ञानी स्व. डॉ. पूरनचंद श्रीवास्तव जी के 110वें जन्मोत्सव “बुन्देली दिवस” पर विशेष ☆ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर ☆

🟢 शिक्षाविद्, लोक-विज्ञानी स्व. डॉ. पूरनचंद श्रीवास्तव 🟢

(1 सितम्बर 110वें जन्मोत्सव “बुन्देली दिवस” पर विशेष)

प्रिय प्रबुद्ध पाठक गण, 

ई-अभिव्यक्ति का आज का अंक शिक्षाविद्, लोक-विज्ञानी स्व. डॉ. पूरनचंद श्रीवास्तव को समर्पित है. पुनर्पाठ के अंतर्गत 1 सितम्बर 110वें जन्मोत्सव “बुन्देली दिवस” के अवसर पर विगत वर्ष बुन्देली दिवस पर प्रकाशित विशेष रचनाएँ आपके अवलोकनार्थ सादर प्रस्तुत हैं.

 – हेमन्त बावनकर,  संस्थापक संपादक ई- अभिव्यक्ति, पुणे 

 

🟢

आप निम्नलिखित टेक्स्ट अथवा लिंक पर क्लिक कर रचनाएँ पढ़ सकते हैं 👉

 

https://e-abhivyakti.com/?p=98005

https://e-abhivyakti.com/?p=17108 

https://e-abhivyakti.com/?p=98404

https://e-abhivyakti.com/?p=98416

https://e-abhivyakti.com/?p=98423

https://e-abhivyakti.com/?p=98421

https://e-abhivyakti.com/?p=98406

https://e-abhivyakti.com/?p=98407

https://e-abhivyakti.com/?p=98405

https://e-abhivyakti.com/?p=93310

♥ ♥ ♥ ♥ ♥

संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ ≈

Please share your Post !

Shares