मराठी साहित्य – विविधा ☆ तो आणि मी…! – भाग १०४ ☆ श्री अरविंद लिमये ☆

श्री अरविंद लिमये

? विविधा ?

☆ तो आणि मी…! – भाग १०४ ☆ श्री अरविंद लिमये ☆

(पूर्वसूत्र- “बाबा तुम्ही सहन करू शकणार नाही अशी एक गोष्ट आहे. आता रात्र बरीच झालीय.. पण हे तुम्हाला आत्ताच सांगणं गरजेचं आहे. तुम्ही त्रास करून घेणार नसाल तरच सांगतो. ” सलिल म्हणाला.

“नाही त्रास करून घेणार. तू सांग.. काय झालंय?”

त्याने जे कांही सांगितलं ते ऐकून मी सून्न झालो. अक्षरशः गोठून गेल्यासारखा क्षणभर बसून राहिलो. तो म्हणाला होता तसं पैशाने ज्याची भरपाई होऊच शकणार नाही असं बरंच कांही मी गमावून बसलो होतो!!)

महापुरामुळे घरी झालेल्या संपूर्ण विध्वंसाचं शक्य तितक्या मोजक्या शब्दात वर्णन करून तो म्हणाला होता,.. “बाबा आपल्या बंगल्यात ८. ५० फूट उंचीपर्यंत पाणी आलेलं होतं. घरात आता फक्त ओल मुरलेल्या भिंती आणि दिवसभर राबून घरातला सगळा चिखल उचलून बाहेर बागेत रचल्या नंतरचे चिखलमाखलेले फ्लोअर अशी अवस्था आहे. ते सगळं पुन्हा मिळवता येईल बाबा पण तुमचं लेखन… ” तो बोलायचा थांबला. त्याने न सांगताही मला अंदाज आला होता… “लाॅफ्टवर ठेवलेल्या माझ्या बॅगा ना.. ?”मी शांतपणे विचारलं.

“हो. त्या तुमच्या सर्व बॅगांमधे तुम्ही जपून ठेवलेलं पूर्वीपासूनचं तुमचं सगळं लेखन भिजून, कुजून लगदा झाल्याने टाकून द्यावं लागलंय बाबा… “

ऐकून मी सून्न झालो. त्या सर्व बॅगांपैकी कुठल्या बॅगेत काय आहे हे मला फक्त माहित होतं असं नाही तर ते तोंडपाठ होतं. माझ्या आजवरच्या सर्व कथांची मासिके, माझी नाटके, एकांकिका, बालनाट्ये यांची हस्तलिखिते, सेन्साॅर सर्टिफिकेटस्, मला मिळालेले सगळे लेखन-पुरस्कार, ‘प्राजक्त’ या मासिक पत्रिकेत दरवर्षी वेगवेगळे विषय घेऊन गेली अकरा वर्षे मी लिहित असलेल्या सदरलेखनाच्या छापील प्रतींचे गठ्ठे ज्यात ‘प्राजक्त’चे तोवरच्या माझ्या लेखांच्या एकूण १३२ छापील प्रतींचे अंक होते… आणि असंच बरंच कांही! सगळं एका रात्रीत स्वाहा झालं होतं!त्या सदरलेखांमधील जवळजवळ सर्वच आशयांवरून एकेक कथा, एकांकिका, किंवा एखादं दोन अंकी नाटकही.. अशा अनेक नव्या साहित्यकृतींना आकार देण्याचा माझा मनोदय होता. त्याचं नियोजन सुरू होतं आणि अचानक माझं सगळं अक्षरधनच पाण्याच्या प्रचंड प्रवाहाने लुटून नेलं होतं!!

माझ्या खरंच ते जिव्हारीच लागलं. त्या रात्री अंथरुणाला पाठ टेकली. आणि त्या अस्वस्थ मनःस्थितीत या विध्वंसात देवघरातील ती दत्ताची मूर्ती? ती.. तीही.. अशीच.. ? या विचाराचाच फटका बसावा तसा मी ताडकन् उठून बसलो. बाकी सर्वजण झोपले होते. सलिल/अनघा दोघांचं उद्याच्या घरस्वच्छतेच्या कामांच्या नियोजनाबद्दलचं बोलणं अस्पष्टसं कानावर आलं न् मी त्या दिशेला धाव घेतली. , !ती.. ती.. दत्तमूर्ती न् इतर सगळे देवही चिखलात वहात जाऊन रुतले गेले असतील तर? तेही चुकून त्या कचऱ्याच्या ढीगात टाकले गेले नसतील ना? नुसत्या कल्पनेनेच मी धास्तावलो.

“बाबा.. तुम्ही झोपला नाहीत अजून? असे घाबरलायत कां? काय झालंय?” मला पहाताच सलिलने विचारलं.

” मला सांग.. आपल्या देवघरातल्या देवांचं काय? ते पण वाहून गेलेत कां? ते.. ते.. चिखलाबरोबर त्या कचऱ्याच्या ढीगात तर टाकले गेले नसतील ना रे?” मी काकुळतीने विचारलं.

सलिलने अनघाकडे पाहिलं

“नाही बाबा… अहो, दिवसभराच्या गडबडीत तुम्हाला सांगायचं राहूनच गेलं. बाबा.. एक आश्चर्य वाटेल अशी आनंदाची बातमी आहे. “

इतक्या सगळ्या विध्वंसातही आनंदाची बातमी?… मला कांही समजेचना.

“बाबा, घरातला निम्मा शिम्मा चिखल बाहेर बागेत टाकून झालाय. राहिलेला उद्या दिवसभरात टाकून होईल. पण आश्चर्य म्हणजे आपण देव मांडतो ते ते छोटं देवघर तिथंच तिरकं होऊन चिखलात रुतून राहिल्याने त्यातले देव आणि ती दत्तमूर्तीही त्यावरच विखुरलेले दिसले. मी ते देवघर आणि ती मूर्ती स्वच्छ धुवून तिथे घरच्या किचन कट्ट्यावर ठेवलीय बाबा… ” हे ऐकताच माझ्या अंगावर शहाराच आला एकदम.. ! माझं सगळं अक्षरधन वाहून गेलं तरी ‘तो’ आहे! मग आणखी काय हवं? मनाला झालेल्या त्या अनपेक्षित आनंदाने मी भारावून गेलो होतो. सगळं ‘त्या’च्यावर सोपवून होईल ते पहात रहायचं असं मनोमन ठरवलं आणि निश्चिंत झालो.. !!

अंथरुणाला पाठ टेकली तेव्हा मध्यरात्र उलटून गेली होती. त्या निश्चिंत मनात आपल्याला या प्राप्त परिस्थितीत काय करता येईल याचे विचार सुरु झाले आणि झोप निघूनच गेली. मी झरकन् उठून शेजारच्या टीपाॅयवर ठेवलेला माझा मोबाईल उचलला. आजवर माझी नाटके आणि एकांकिका स्पर्धेत सादर केलेल्या मुंबई, पुणे, अहमदनगर, डोंबिवली, नाशिक, अमरावती, नागपूर, इंदौर अशा विविध ठिकाणच्या सर्व संस्थांची व्हाॅटस् अॅप काॅन्टॅक्स उपलब्ध होती. मी लगेचच सर्वांना सविस्तर मॅसेज पाठवून पुरामुळे निर्माण झालेल्या गंभीर परिस्थितीची कल्पना दिली आणि त्यांनी सादर केलेल्या माझ्या नाटक/एकांकिका यांच्या संहिता त्यांच्याकडे उपलब्ध असतील तर त्याची एक प्रत प्लीज मला पाठवावी अशी विनंती केली. मी यापेक्षा जास्त कांहीच करू शकत नव्हतो.

माझ्या या नाट्यसंहितांपेक्षाही माझ्यासाठी कणभर जास्तच महत्वाचं होते ते ‘प्राजक्त’ मधल्या जाने. २०१० ते जुलै २०१९ या जवळजवळ साडेनऊ वर्षातल्या माझ्या सदर लेखनाचे १३२ अंक पुन्हा मिळवणे. पण तो प्रश्न अजून अधांतरीच होता.

दुसऱ्या दिवशी सकाळी मी ‘प्राजक्त’ च्या ऑफिसमधे फोन करून विचारणा केली. पुरापूर्वी कांही दिवस आधीच साफसफाई करताना कपाटांमधे जागा करण्यासाठी तिथे साठलेले सगळे जुने अंक त्यांनी रद्दीत विकून टाकले होते!

अखेर एक शेवटचा उपाय म्हणून त्या महिन्याच्या सदरासाठी लिहिलेल्या लेखाबरोबर मी एक जाहीर निवेदन पुढच्या अंकात प्रसिद्ध करण्यासाठी लिहून दिलं. त्यात माझी नेमकी अडचण विशद करून प्राजक्तचे सुरूवातीपासूनचे अंक कुणाकडे उपलब्ध असतील तर मला कळवावे असं वाचकांना आवाहन केलं आणि मी त्याच्या झेरॉक्स कॉपीज् स्वखर्चाने काढून घेईन हेही लिहिलं. या सगळ्या सदरलेखनाला आजपर्यंत कितीतरी वाचकांनी कौतुक करणाऱ्या प्रतिक्रिया वेळोवेळी आवर्जून पाठवल्या होत्या. त्यांच्यापैकी अगदी एकाने जरी ते अंक जपून ठेवले असतील तर त्या अंकांची मला गरज आहे हे निवेदन दिल्याशिवाय त्याच्यापर्यंत पोचणार कसं? हाच विचार ते निवेदन दिलं तेव्हा माझ्या मनात आलं. आणि ध्यानीमनी नसताना खरंच चमत्कार घडला! जादूची कांडी फिरावी तशी सगळी सूत्रं वेगाने हलत गेली आणि… !

दुसऱ्याच दिवशी सर्व नाट्यसंस्थांकडून मी पाठवलेल्या मेसेजेस् ना सकारात्मक उत्तरे आली आणि पुढे दोन-तीन दिवसात त्यापैकी काहींनी पीडीएफ् रुपात तर बाकीच्यांनी त्या संहितेची झेराॅक्स काॅपी मला पाठवून माझ्या हरवलेल्या अक्षरधनाची कांही प्रमाणात कां होईना भरपाई केली. हा एक सुखद धक्काच होता माझ्यासाठी! नंतर मधे आठदहा दिवसही उलटले नसतील आणि अचानक एक फोन आला.

“आपण अरविंद लिमये बोलताय ना?” आवाज अपरिचित. कांहीसा थकलेला. माधवनगरचे कुणी सुधाकर फाटक आजोबा बोलत होते.

“मी प्राजक्तमधलं तुमचं निवेदन वाचलं. त्यातले तुमचे लेख मला आवडतात. त्यामुळेच मी सभासद झाल्यापासूनचे म्हणजे साधारण २०१५पासूनचे सगळे अंक क्रमवार अॅरेंज करून ते जपून ठेवलेत. पण अट एकच. तुम्ही स्वतः येऊन ते घेऊन जायचे. त्यामुळे निदान आपली भेट तरी होईल. आणि हो.. त्याच्या झेराॅक्स काढायची तसदी नका घेऊ. आज माझे वय आहे ८५. मी प्राणपणाने जपलेले ते अंक योग्य माणसाच्या हाती गेल्याचं समाधान मला मिळतंय याचा मला आनंदच आहे… !” ते बोलत होते. मी थक्क होऊन ऐकत होतो. हे एवढंच नव्हतं. दुसऱ्याच दिवशी ‘प्राजक्त’चं मुद्रण कोल्हापूरला ज्या प्रेसमधे होत असे त्या प्रेसचे श्री. डबीर यांचाही निरोप आला. त्यांच्याकडून २०१० च्या आधीचेही सगळे अंक सेव्ह असल्याने त्यांनी ते पेनड्राईवमधे डाऊनलोड करून देण्याचे आश्वासन दिले.. !

जे मला कधीच परत मिळू शकणार नाही असं मला वाटलं होतं ते माझं सगळं अक्षरशः मला अचानक परत मिळणं हा चमत्कारच होता माझ्यासाठी !!

हे सगळं इतकं अनपेक्षित, इतकं सहज, आणि इतकं अल्पावधीत घडलं की हे एखादं सुखद स्वप्नच आहे असंच वाटत राहिलं! प्रतिकूल परिस्थितीत हे असं हवं ते हवं तसं मला बहाल करण्याची ‘त्या’ची किमया म्हणजे अंधारून आलेल्या मनात भरून राहिलेला मिट्ट काळोख क्षणार्धात उजळून टाकणाऱ्या लख्ख प्रकाशासारखी ‘त्या’च्या अलौकिक स्पर्शाची अनुभूती वाटली मला!

नुकतेच घडून गेल्यासारखे मला इतक्या वर्षांनंतरही स्वच्छ आठवणाऱ्या स्वेच्छानिवृत्ती नंतरच्या काळातले हे दोन प्रातिनिधिक प्रसंग.. ! खरंतर तो आणि मी या विषयाशी संबंधित मनात घर करून राहिलेल्या अशा असंख्य आठवणींचा या प्रदीर्घ अशा सदरलेखनाच्या निमित्ताने मी घेतलेला वेध म्हणजे एकापरीने ‘त्या’चा स्पर्श जाणवलेल्या आजवरच्या आठवणीत साठलेल्या अनेक अनुभवांकडे माझे मागे वळून पहाणेच होते! यातून माझ्या नकळत्या वयापासून मी मनात जपलेला ‘तो’ आज वानप्रस्थात प्रवेश केलेल्या माझ्या आयुष्याच्या उतरत्या वळणावर उभ्या मला कसा दिसतो ते आता या सदराच्या पुढच्या समारोपाच्या भागात.. !

क्रमश:…  (प्रत्येक गुरूवारी)

©️ अरविंद लिमये

सांगली (९८२३७३८२८८)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ ५ अनुवादित लघुकथा – आणखीन एक वीरगती / विश – नवीन वर्षाची / वारसा / भीती / नात्यांचा अंत – हिन्दी लेखक : सेवासदन प्रसाद ☆ मराठी भावानुवाद – जस्मिन शेख ☆

जस्मिन शेख

🌸 जीवनरंग 🌸

☆ ५ अनुवादित लघुकथा – आणखीन एक वीरगती / विश – नवीन वर्षाची / वारसा / भीती / नात्यांचा अंत – मूळ हिन्दी लेखक : सेवासदन प्रसाद ☆ मराठी अनुवाद – जस्मिन शेख ☆

☆ १. आणखीन एक वीरगती ☆

आपल्या कुटुंबापासून हजारो किलोमीटर लांब सियाचीनच्या बर्फाच्छादित दऱ्याखोऱ्यांमध्ये देशाची सुरक्षा करण्यासाठी तैनात असलेल्या अनेक सैनिकांसोबत हनमन थप्पा आपल्या धरती मातेच्या सेवेत हजर होता. काही क्षणातच डोळ्याची पापणी लवते न लवते तोच बर्फाच्या एका प्रचंड वादळाने काही सैनिकांना आपल्या मिठीत कवटाळले. तेव्हा बर्फच त्यांचे कफन बनले, बर्फातच त्यांचे दहन झाले आणि बर्फच त्यांची कबर बनली. मग सुरू झाले ‘सर्च अभियान’! 

साऱ्या जगाने तर त्यांना मृत घोषित केले होते. परंतु हनमन थप्पा यांची पत्नी महादेवी आणि कन्या नेत्रा यांच्या डोळ्यात मात्र अजूनही आशेची किरणे चमकत होती. भारतीय नारीच्या दृढ विश्वासाने प्रेरित झालेली होती ना!

शेवटी एका पत्नीच्या अचल श्रद्धेने चमत्कार घडवला. प्रचंड बर्फाच्या खाली घुसमटून गेलेला, दबून गेलेला हनमन थप्पा जिवंत सापडला. त्याच्या पत्नीचा विश्वास बहरून आला. ती हनमन थप्पाच्या सुरक्षेसाठी देवाला साकडे घालू लागली. मग काय! पूर्ण देशात प्रार्थनेचे वादळ वाहू लागले. मंदिरातील घंटा रात्रंदिवस निनाद करू लागली. मशिदीमध्ये नमाजचे पठण होऊ लागले. चर्चमध्ये प्रार्थनांचा गजर चालू झाला. तर गुरुद्वारा मधून ग्रंथं वाचनाचा आवाज घुमू लागला. भारतीयांची ही अनोखी राष्ट्रभावना बघून अख्खे विश्व विस्मयचकित झाले. ‘मेरा भारत महान’ ही भावना सर्वांच्या मनावर विराजमान झाली. सीमेवर तैनात असलेल्या सैनिकांचे मनोधैर्यही वाढू लागले.

पण म्हणतात ना ‘जो आवडे सर्वांना तोची आवडे देवाला’. शेवटी करोडोंना दुःखाच्या अंधारात लोटून एका सैनिकाला वीरगती प्राप्त झाली आणि तेव्हा भारत मातेला सुद्धा अश्रू अनावर झाले.

मूळ हिंदी कथा : सेवासदन प्रसाद

मराठी अनुवाद : जस्मिन शेख

२. विश… नवीन वर्षाची !

वर्षाची शेवटची रात्र. शर्मा साहेब कुटुंबासह हॉल मध्ये विराजमान! रात्री १२वाजण्याची उत्सुकता!आज घड्याळात बघण्याची गरजच काय? फटाक्यांचा आवाज आणि आतषबाजीनेच कळून चुकेल की गतवर्षाचे बारा वाजलेत आणि नवीन वर्षाचे आगमन झाले आहे.

शर्मा साहेब म्हणाले, ” नेहमीप्रमाणे आज सगळ्यांनी आपापली एक विश सांगायची आहे. आणि ती पूर्ण करण्यासाठी वर्षभर कटिबद्ध रहायचे आहे. ” 

शर्मा वहिनींनी सुरुवात केली, ” माझी तर अशी इच्छा आहे की माझा मुलगा शिकून डॉक्टर बनावा आणि मुलीला सुखी सासर मिळावे. “

यावर नीताने लगेच आपली इच्छा प्रकट केली, ” मी माझं शिक्षण पूर्ण करून आधी नोकरी करणार नंतर लग्न, जेणेकरून जीवनात कोणती कमतरता भासू नये. “

शर्मा साहेब आणि अखिल शांत राहीले. शेवटी एका बापाने आपली इच्छा व्यक्त केली, “माझी केवळ इतकीच मागणी आहे की, माझ्या मुलाची आणि मुलीची इच्छा पूर्ण होवो आणि माझं म्हातारपण सुखात जावो. “

आता सगळ्यांच्या नजरा अखिलकडे वळल्या. फटाके फुटू लागले, रोषणाईचे नृत्य सुरू झाले. त्यातच अखिलने धमाका फोडला, ” बाबा, मला नेता बनायचे आहे. ” बाबांना धक्का बसला. मग समजावण्याच्या सुरात म्हणाले, “बाळा, नेत्याचं जीवन विवादातच अडकलेलं असतं. न पटणा-या मूल्यांशी गाठ बांधावी लागते. आणि अनिश्चित कार्यकाळ असतो. नेता केवळ लेखक आणि मिडियातील एक व्यंगचित्रं बनून राहतं. “

– – पण अखिल आपला दृढविश्वास कायम ठेवत म्हणाला, ” नाही बाबा, या देशाला आता योग्य नेत्याची गरज आहे. जर देशच विस्कटलेला असेल तर डॉक्टर, इंजिनिअर कसे टिकतील देशात? “

मूळ हिंदी कथा: सेवासदन प्रसाद

मराठी अनुवाद: जास्मिन शेख

☆ ३. वारसा ☆

रोगशय्येवर पडून शेवटच्या घटका मोजणारा बाप आणि समोर त्याचा स्नेहकांक्षी ! बाप मनातलं बोलायला व्याकूळ आणि मुलाची ऐकण्याची तेवढीच अतुरता ! बापाने स्पष्ट शब्दात मन मोकळं केलं, “बाळा, माझ्याकडे या घराशिवाय आता काहीच शिल्लक उरलं नाही. जे काही होतं ते सगळ तुझ्या संगोपनासाठी आणि शिक्षणासाठी खर्च झालं. आज मला अभिमान आहे की माझा मुलगा विदेशात एका मोठ्या हुद्द्यावर नोकरीला आहे. बस जे काही आहे ते या कपाटात बंद आहे. “

मुलाला आश्चर्य वाटलं. लोकं मौल्यवान वस्तू एकतर बँकेतील लॉकर मध्ये ठेवतात किंवा तिजोरीत! मुलाच्या मनातील गोंधळ अचूक ओळखून त्या लेखक बाप ख-या परिस्थितीवरून पर्दा उठवत म्हणाला, “मुला, या कपाटात माझी प्रकाशित पुस्तके, अप्रकाशित साहित्य-लेखन‌, वाचक आणि लेखक मित्रांनी पाठवलेले प्रशंसापत्र आहेत. हीच माझी आयुष्यभराची पुंजी आहे. जी मी तुझ्या हाती सुपूर्द करतो. “

मुलाला माहित होते की वडिलांनी अखंड आयुष्य साहित्य सेवा केली होती. शेवटी मुलगा अभिमानाने बोलला, “बाबा, या घराला मी साहित्य संग्रहालय बनवेन, अप्रकाशित लेखन‌ साहित्य प्रकाशकाकडे पाठवेन, सर्व प्रशंसापत्रांचा एक सुंदर अल्बम बनवेन आणि तुमचे स्मृतीचिन्ह आपल्या कुटुंबाची परंपरागत संपत्ती म्हणून कायम जतन करेन. हाच माझा अनमोल वारसा आहे. “

– – – असहनीय वेदनेने त्रस्त असून ही बाबांचे डोळे आनंदाने चमकू लागले.

मूळ हिंदी कथा: सेवासदन प्रसाद

मराठी अनुवाद: जस्मिन शेख

☆ ४. भीती ☆

विधवा आईच्या मृत्यूनंतर शालिनीने एक खूप मोठा निर्णय घेतला की ती तिच्या लहान बहिणीला एकटी सोडू शकत नाही. तिला सोबत ठेवल्याने तिची काळजीपण राहणार नाही आणि मोहिनीला एकटेपणा छळणार नाही. पतीच्या सहमतीने तिला आणखीन बळ दिलं.

मोहिनी, ताईच्या या निर्णयाने आपले सर्व दु:ख विसरून गेली. विचार केला, ताई आणि भावजींच्या आधाराने ती तिचे भविष्य उभारण्याचा प्रयत्न करेल. शहरातील प्रत्येक दिवशी घडणा-या वाईट घटनांमुळे तिच्या मनात भयंकर भिती घर बनवत होती. तिच्यात असुरक्षिततेची भावना वाढीस लागली. अशात ताईचे संरक्षण एक शक्ती बनून तिच्यातील भीती कमी करत होती. ती आता आनंदात होती. मनापासून ताई-भावजींची काळजी घेऊ लागली.

अचानक पोटदुखीमुळे शालिनीला दवाखान्यात ऍडमिट व्हावे लागले. थोड्या वेळाने ताईच्या कुशलतेचा समाचार ऐकून तिला बरे वाटले. भावजी दवाखान्यातून कधी परत येतील कोणास ठावूक? त्यांना पण पत्नीच्या तब्बेतीची काळजी आहेच की! त्यांच्याकडे डुप्लिकेट चावी आहेच. नाहीतर सकाळी दवाखान्यात जावून भावजींना घरी पाठवते. या विचारातच शेवटी ती झोपायला गेली.

अर्ध्या रात्री कोणाच्यातरी स्पर्शाने मोहिनीला जाग आली. समोर भावजींना पाहून चाट पडली. जी भिती मरून गेली होती ती पुन्हा जिवंत होऊ लागली. घृणा अन् क्रोधाच्या आवेशाने भावजींचा चेहरा नखांनी रक्ताने माखून टाकला. जुन्या भितीने पुन्हा डोके वर काढले. ती रात्र खूप जड गेली. आता केवळ घरातील नव्हे तर अखंड जगातील भितीशी संघर्ष करण्यासाठी ती कटिबद्ध झाली. पहाटेच तिच्या पायांनी वाट धरली… गर्ल्स होस्टेलची!

मूळ हिंदी कथा: सेवासदन प्रसाद

मराठी अनुवाद: जस्मिन शेख

☆ ५. नात्यांचा अंत ☆

खुशहाल वृद्धाश्रमाचा रौप्यमहोत्सवी समारंभ ! समारंभाचे प्रमुख अतिथी अमेरिकेचे प्रसिद्ध उद्योगपती श्री. आलोककुमार यांचे आगमन! आलोककुमार याच शहराचे रहिवासी होते. याच शहरातील गल्ली-बोळात त्यांचे बालपण व्यतीत झाले होते. त्यांना माहित होते की भारतात अनुदान देऊन सन्मान मिळवण्याची प्रथा आहे. या शहरातील एक ही वृद्ध व्यक्ती निराधार राहू नये यासाठी त्यांनी खुशहाल वृद्धाश्रमला ५० लाखांची देणगी दिली.

आता मुख्य अतिथींचे गुणगान करणे, जोरदार स्वागत करणे तसेच त्यांच्या उदारतेची प्रशंसा करणे हे तर कमिटी सदस्यांची नैतिक जबाबदारी बनते. कार्यक्रमादरम्यान अध्यक्षांनी वृद्धाश्रमातील वरिष्ठ वृद्धाच्या हस्ते श्री. आलोककुमार यांचा सत्कार करण्याचे ठरवले. जेव्हा एक वृद्ध व्यक्ती कांप-या हातात फुलांचा हार घेऊन मंचावर आली. तेव्हा आलोककुमार यांच्या चेह-याचा रंग उडाला. पण गतकाळातील सर्व दु:खांवर मौनाचे पांघरूण घालून एका बापाने आपल्या मुलाच्या इभ्रतीत मोरपीस खोवले. श्री आलोककुमार यांची मान लाजेने झुकली पण लोकांना वाटले त्यांनी सत्कारासाठी मान झुकवली.

मूळ हिंदी कथा: सेवासदन प्रसाद

मराठी अनुवाद: जस्मिन शेख

मिरज जि. सांगली मो 9881584475

 

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ कुलकर्णी सरांचे अपेक्षित प्रश्न ☆ श्री अमोल केळकर☆

श्री अमोल केळकर

??

☆ कुलकर्णी सरांचे अपेक्षित प्रश्न ☆ श्री अमोल केळकर ☆

साधारण 90 च्या दशकात आम्ही खाजगी क्लास ला जात होतो. (म्हणजे आमची इच्छा नव्हती पण आमच्या आई-वडिलांना वाटायचं, पोरगा शिकून मोठा व्हावा). आमच्या शाळेतील सरांकडेच आम्ही शनिवार रविवार क्लासला जात असू 

ही शिकवणी म्हणजे आमच्यासाठी अभ्यास यथातथाच पण टवाळखोरी जास्त असा विषय होता. (मित्रांना भेटणे आणि मैत्रिणींना बघणे)

रविवारी सकाळी तर सकाळच्या दूरदर्शन वर लागणाऱ्या मालिका ( कच्छी धूप वगैरे वगैरे) सहित क्लासचा कॉम्बो पॅकेज असायचा.

परीक्षेच्या आधी काही दिवस मात्र वातावरण गंभीर व्हायचं. ( इतरांसाठी)

प्रत्येक विषयाच्या पाठ्यपुस्तकातील अपेक्षित कुठले प्रश्न येतील यावर कुलकर्णी सर टिकमार्क करून द्यायचे (भले एखादा त्यांचा विषय नसला तरी)

सगळेजण जाम खुश व्हायचे, आता हेच प्रश्न परीक्षेत येणार असं वाटायला लागायचं ( 10 पैकी 8 प्रश्नांवर टिक असायची).

परीक्षा झाल्यावर हातातली प्रश्नपत्रिका त्या क्षणी कचऱ्याच्या टोपलीत जायची, त्यामुळे सरांनी टिक करून दिलेले किती प्रश्न 

पेपरात आले हे मात्र (मला) कधीच समजलं नाही.

70-80 % मार्क मिळवत गेलो आणि हे आम्हाला ‘यश ‘ वाटायचं.

आमची पिढी समाधानी होती.

आमचं गाव ‘ मोटे ‘ नसलं तरी लहान ही नव्हतं 

शिक्षकांचे काही लाडके विद्यार्थी असले तरी कुणी ‘ चाटे’ गिरी करायचे नाहीत, शिक्षक करूही द्यायचे नाहीत

(आपल्या क्लासला विदयार्थी येत नाही म्हणून कुणी बदला घेत नसत)

(ढगफुटी आणि) पेपरफुटी न होण्याच्या काळात आमचे शिक्षण झाले हे आमच्या पिढीचे नशीब 

टीप : 12 वीला बोर्डाच्या परीक्षेत, पेपराच्या आधी 10 मिनिटे आमचा एक मित्र 1-2 प्रश्न सांगायचा आणि ते प्रश्न हमखास यायचेच. तो सध्या ऑस्ट्रेलियात स्थायिक होऊन ज्योतिषी म्हणून प्रसिद्ध आहे, (त्याची नाशिकला शाखा नाही)

श्री अमोल केळकर

बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

poetrymazi.blogspot.in, kelkaramol.blogspot.com, a.kelkar9@gmail.com

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ हाच चहा -☆ विभावरी कुलकर्णी ☆

विभावरी कुलकर्णी

??

☆ हाच चहा– ☆ विभावरी कुलकर्णी

बालपणी फुगडी खेळताना, “चहा बाई चहा, गवती चहा, आम्हा मैत्रिणींची फुगडी पाहा” या गाण्याने झालेला चहाचा परिचय. ज्या वयात चहाची चवही माहीत नव्हती. पण गाण्यातून मात्र परिचय होता. त्याच वेळी घरात स्टोव्ह वर चहा मोठ्या पातेल्यात ठेवला जायचा त्या काळी, मी लहान असताना एकत्र कुटुंब पद्धती होती. एकत्र म्हणजे आई, वडील आणि मुलं नव्हे तर सगळे काका, त्यांची मुले असे मोठे कुटुंब असायचे. आणि चहाला बुडबुडे आलेत का? हे बघायला कोणीतरी सांगायचे. आणि ते छोटे मोठे कसे आलेत हे हात, गाल याच्या मदतीने सांगितले जायचे. आणि आत्या किंवा काकू चहा किती उकळला आहे ते ओळखायच्या. मग त्यात दूध घालून झाकण ठेवून थोडा वेळ मुरवायचा. मग दुसऱ्या पातेल्यात गाळून एकेकाला दिला जायचा.

असा चहाचा परिचय! पण प्यायला मात्र बंदी. चहा पिऊन काळी पडशील अशी भीती दाखवली जायची. अजूनही हे कळले नाही, चहा न पिता रंग मात्र चहा सारखा झाला कसा? 

मोठे झाल्यावर कळले, इतक्या लहानपणी ज्याचा परिचय झाला तो चहा आपला नाहीच! कोणी एक शेन नुंग नामक चिनी शासक उकळते पाणी घेऊन झाडाखाली बसले होते. आणि अचानक झाडाचे पान त्यात पडले आणि त्या पाण्याचा रंग व चव बदलली हाच तो पहिला चहा. नंतर असेही वाचले, काही बौद्ध भिख्खू ध्यानाला बसताना विशिष्ठ झाडाची पाने खायचे, त्यामुळे त्यांना झोप येत नसे. हाच तो चहा व त्याची पाने. नंतर त्यात साखर, दूध घालून आपला चहा तयार झाला. आणि विविध नावांनी ओळखला जाऊ लागला. आसाम, दार्जिलिंग, निलगिरी अशी नावे घेऊन आला. पण आम्हाला हे काहीच माहिती नसायचे. आम्ही पुण्यातल्या जगप्रसिद्ध महाराष्ट्र टी डेपो समोर रांगेत उभे राहून फॅमिली मिक्सचर मिळाला की धन्यता मानणार. हाच आमचा चहा!

दिवसेंदिवस त्यात विविध पदार्थ मिक्स होऊन विविध उपयोगाचे, चवीचे चहा तयार झाले. आणि आता तर फारच विविधता घेऊन विविध नावांनी चहा येत आहेत. आणि त्याचे दुष्परिणाम होऊ नयेत याची पुरेपूर काळजी घेऊन चहाचे कप आकाराने लहान होत चालले आहेत. अगदी पोलिओ डोस घेतल्या प्रमाणे वाटते.

हे असे मसाला, गवती, आले, विलायची चहा घेता घेता एक दिवस आईस टी समोर आला. आणि गरम, कडक चहाच्या कल्पनेला पुन्हा धक्का बसला. आणि आता तर आपली चहा पावडरच चहातून गायब झाली. आणि याला चहा कसे म्हणावे? हा माझ्या बाल बुध्दीला प्रश्न पडला. मग धाव घेतली गुगल बाबांच्या कडे! त्यांनी सांगितले चहा/टी म्हणजे कोणतीही पाने उकळली की झाला टी आणि आताचे टी बघून गरगरलेच! कारण काही चहा मध्ये पाने पण नाही तर चक्क फुले, काहित झाडाच्या खोडाची साल असे वापरलेले असते.

१५ डिसेंबर हा दिवस मूळचा ‘आंतरराष्ट्रीय चहा दिवस’ म्हणून साजरा केला जातो. २००५ मध्ये भारतात (नवी दिल्ली) या दिवसाची सुरुवात झाली. ज्याचा मुख्य उद्देश चहा उत्पादक देशांमधील कामगारांच्या हक्कांना आणि चहा उद्योगाला प्रोत्साहन देणे हा होता. तथापि संयुक्त राष्ट्राने (UN) भारताच्या प्रस्तावानुसार २१ मे हा दिवस अधिकृत ‘आंतरराष्ट्रीय चहा दिवस’ म्हणून घोषित केला आहे. २१ मे रोजी बहुतांश देशांमध्ये चहाचा हंगाम सुरू होत असल्यामुळे हा बदल करण्यात आला.

असे चहाचे अवतार बघता बघता आपल्या चहाचे अस्तित्व धोक्यात आले की काय अशी भीती वाटू लागली आहे. आणि मग चहा, पोहे कार्यक्रमात काय दिले जाणार? आणि चाय पे बुलाया है या ऐवजी कोणते पेय येणार? आणि हाच चहा कोणत्या स्वरूपात मिळणार? आणि चहाच्या टपरीवर गप्पा मारत काय प्यायचे? घरी आलेल्या पाहुण्यांना काय द्यायचे? असे बरेच प्रश्न मनात आहेत. पण सध्या तरी याची काळजी नाही. अजून तरी हाच चहा प्रचलित आहे. आणि चहाला भेटू या! हे आमंत्रण अजून तरी कायम आहे.

© विभावरी कुलकर्णी

मेडिटेशन,हिलिंग मास्टर व समुपदेशक, संगितोपचारक.

सांगवी, पुणे

📱 – ८०८७८१०१९७

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “दृढ निश्र्चयाचा महामेरू ” – इंग्लिश लेखक : अज्ञात ☆ मराठी अनुवाद व प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर ☆

श्री मोहन निमोणकर 

? इंद्रधनुष्य ?

☆ “दृढ निश्र्चयाचा महामेरू ” – इंग्लिश लेखक : अज्ञात ☆ मराठी अनुवाद व प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर

 – – आपल्या उदाहरणाने लाखो लोकांना स्फूर्ती आणि हिंमत देणारी ही एक सत्यकथा आहे.

1983 मध्ये मेरठ येथे जन्मलेल्या इरा सिंगला यांना जन्मतःच पाठीच्या कण्याच्या एका दुर्धर आजाराने ग्रासले होते. त्यांच्या हातांच्या हालचालींना काही बंधने आली होती. मात्र अशा अवस्थेतही त्यांच्या आई वडिलांनी त्यांना कुठलीच वेगळी आणि विशेष वागणूक दिली नाही. आणि म्हणूनच त्या आपले कॉम्प्युटर इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण करू शकल्या. शिवाय नंतर दिल्ली विद्यापीठाची m. b. a. ची पदवीही मिळवू शकल्या, आणि लगेचच कॅडबरी इंडिया या नामांकित कंपनीत strategic manager म्हणून व कोकाकोला कंपनीत मदतनीस म्हणूनही त्यांनी काम सुरू केले.

2009 मध्ये त्यांनी I. A. S. होण्याचे ठरविले आणि 2010 मध्ये पहिल्या प्रयत्नातच त्या U. P. S. C. ची सिव्हिल सर्विस मधील परीक्षा यशस्वीपणे पास होऊ झाल्या.

त्यांना भारतीय महसूल विभागाची (Revenue Dept.) जबाबदारी देण्यात आली.. पण सरकारकडून, ‘शारीरिक दृष्ट्या असमर्थ’.. हा निकष लाऊन त्यांना नाकारण्यात आले.. सरकारतर्फे असे सांगण्यात आले की त्यांच्यातील गंभीर स्वरूपाच्या शारीरिक व्यंगामुळे त्यांच्या हालचालींवर मर्यादा आहेत.. एखादी गोष्ट ढकलणे.. ओढणे.. किंवा उचलणे या क्रिया त्या करूच शकत नाहीत, आणि म्हणून I. A. S. Officer म्हणून काम करण्यास त्या सक्षम नाहीत.

या गोष्टीचे त्यांना अतिशय दु:ख झाले. पण अतिशय निश्चयाने त्यांनी ‘केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरण’ या विशेष अर्धन्यायिक संस्थेकडे सरकारच्या या निर्णयाविरुद्ध तक्रार नोंदवली. बराच काळ लोटला पण सरकार काही त्यांच्या भूमिकेत बदल करायला तयार नव्हते….. आणि आता इराही थांबायला तयार नव्हत्या…

… 2011 साली त्या पुन्हा यूपीएससी च्या परीक्षेला बसल्या आणि पासही झाल्या. या वेळी त्यांना रेल्वे विभाग देण्यात आला, पण पुन्हा त्याच शारीरिक व्यंगाच्या सबबीखाली यावेळीही त्यांना नोकरीसाठी अपात्र ठरविण्यात आले.

2013 साली त्या पुन्हा एकदा UPSC च्या परीक्षेला बसल्या आणि अर्थातच पासही झाल्या. पण याही वेळी सरकारकडून पुन्हा तेच कारण दिले गेले. जगातील सर्वात कठीण असलेल्या एका परीक्षेत एक मुलगी तीन वेळा उत्तम गुणांनी पास होते, पण तिच्यातील शारीरिक व्यंगामुळे नोकरी करण्यास ती असमर्थ आहे हेच दरवेळी अधोरेखित केले गेले.. ही खरोखर फार खेदाची आणि तितकीच संतापजनक बाब आहे.. आणि याही वेळेस केंद्रीय न्यायाधिकरणाकडून त्यांना न्याय मिळाला नाही.

– – आता प्रकरण न्यायालयात गेले. दरम्यान 2014 साली त्या पुन्हा एकदा UPSC च्या परीक्षेस बसली. या वेळेस एक विशेष गोष्ट घडली… त्या नुसत्या पासच झाल्या नाहीत, तर संपूर्ण जगातल्या सर्वात जास्त कठीण समजल्या जाणाऱ्या या परीक्षेत त्या सबंध भारतात पहिल्या आल्या. आजपर्यंतच्या यूपीएससीच्या इतिहासात प्रथमच इतके जास्त गुण त्यांना मिळाले होते.. म्हणजे एकूण 2025 पैकी 1082 गुण ! 

… आता मात्र सरकारला त्यांचा पवित्रा बदलावाच लागला आणि इरा यांची अलीपुर, नवी दिल्ली येथे “सब डिव्हिजनल मॅजिस्ट्रेट” म्हणून नेमणूक झाली. या नेमणुकीच्या पहिल्याच वर्षात त्यांनी जवळजवळ 340 बालमजुरांचे जीव वाचवले होते. त्यांना सक्तीने बालमजूर म्हणून पाठविले जात असताना इरा यांच्या सक्त आदेशानुसार त्यांची सुटका करून त्यांना त्यांच्या कुटुंबियांच्याकडे सुपुर्द करण्यात आले होते…

आणि इथेच सरकारची खात्री झाली की IAS Officer ची जबाबदारी स्वीकारल्यावर त्या उत्तम काम करू शकतात… त्यांचे शारीरिक व्यंग कुठल्याही कामात अडसर ठरत नाही.

सध्या त्या अरुणाचल प्रदेशात अतिरिक्त सचिव म्हणून काम करताहेत. या शिवाय त्या भारत सरकारच्या न्याय आणि अधिकारी मंत्रालयातील दिव्यांग विभागाच्या मुख्य प्रतिनिधी म्हणूनही काम पाहत आहेत.

… या व्यतिरिक्त महिला व बाल संगोपन आणि नीती आयोग यांच्या मुख्य प्रतिनिधी, केंद्रीय निवडणूक मंडळाच्या सुलभ निवडणुकीच्या राष्ट्रीय मंडळावर प्रतिनिधी म्हणूनही त्या कार्यरत आहेत.

अशा या जिद्दी आणि संयमी आणि प्रचंड बुद्धिमान असलेल्या इरा सिंघल यांनी तरुणांना केलेला उपदेश खूपच बोलका आहे.

त्या म्हणतात…

” तुमची स्वप्ने दुसरे कोणीतरी सत्यात उतरवून देईल याची वाट बघत कधीच थांबू नका.. त्यासाठी तुम्ही स्वतः प्रयत्नशील रहा “.

दृढ निश्चय आणि दुर्दम्य हिंमत यांचे मूर्तिमंत उदाहरण म्हणायला हवे अशा IAS ऑफिसर इरा सिंघल यांची ही सत्य गोष्ट लाखो लोकांना प्रेरणादायी ठरेल यात शंकाच नाही.

इंग्लिश लेखक : अज्ञात 

मराठी अनुवाद व प्रस्तुती : मोहन निमोणकर 

संपर्क – सिंहगडरोड, पुणे-५१ मो.  ८४४६३९५७१३.

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ पॅरालिम्पिक्स (Paralympics) क्या है ?  ☆ श्री मकरंद पिंपुटकर ☆

श्री मकरंद पिंपुटकर

? इंद्रधनुष्य ?

पॅरालिम्पिक्स (Paralympics) क्या है ? ☆ श्री मकरंद पिंपुटकर 

सन २०१९. गोविंदगढ, तालुका जेवर, जिल्हा गौतम बुद्ध नगर, उत्तर प्रदेश.

… जन्मतःच एक पाय दुसऱ्या पायापेक्षा लहान असलेल्या प्रवीण कुमार ने गुगलवर एक प्रश्न टाकला – “पॅरालिम्पिक्स क्या है ?” क्षणार्धात उत्तर आलं – “दिव्यांग (अपंग) खेळाडूंसाठीचे ऑलिंपिक”. (दुसऱ्या महायुद्धात जखमी / अपंग झालेल्या सैनिकांसाठी १९४८ साली सुरू झालेल्या या स्पर्धा सुरू झाल्या होत्या.)

हा प्रश्न विचारला तेव्हा प्रवीण अवघ्या १६ वर्षांचा होता. खेळांची आवड होती, व्हॉलीबॉल खेळायचा तो, पण धावताना मात्र अधू पाय त्याला त्रास द्यायचा. उंच उडी मारणे मात्र सहजसुलभ वाटायचे.

२०१९ मधील त्या एका गूगल सर्चने सर्व काही बदलून टाकले.

प्रविण आता उंच उडीवर कसून मेहनत घेऊ लागला, शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेऊ लागला. २०२० साली टोकियो, जपान इथे होणाऱ्या पॅरालिम्पिक्समध्ये तो भारताचे प्रतिनिधित्व करत होता.

टोकियोमध्ये तो पुरुषांच्या उंच उडी T६४ प्रकारात २. ०७ मीटरची उडी मारतो आणि रौप्यपदक घेऊनच बाहेर पडतो. (शारीरिक पंगुत्वाचे वेगवेगळे गट केले आहेत, त्यातील एकातरी पायामध्ये गुडघ्याखालून व्यंग असण्याचा गट T६४ आहे.) भारतात जल्लोष झाला, पण स्वतः प्रविण समाधानी नव्हता.

त्याने प्रशिक्षक डॉ. सत्यपाल सिंग यांना सांगितले, “पुढच्या वेळी सुवर्णपदक. ” प्रत्येक वेळी पहिल्याच प्रयत्नात अडथळा पार करणाऱ्या त्या मुलासाठी रौप्यपदक पुरेसे नव्हते.

भारत सरकारने २०२१ साली अर्जुन पुरस्काराने प्रविणला गौरवले.

प्रशिक्षकांना दिलेल्या वचनाप्रमाणे, पुढच्या स्पर्धेत, २०२२ च्या आशियाई पॅरा गेम्समध्ये प्रविणने आपल्या पहिल्या सुवर्णपदकाला गवसणी घातली. २०२३ साली जागतिक चॅम्पियनशिप स्पर्धेत कांस्यपदक मिळवले आणि आता पाळी होती २०२४ सालच्या पॅरिस पॅरालिम्पिक्सची.

६ सप्टेंबर २०२४. स्टेड डी फ्रान्स. पुरुषांची उंच उडी T६४ अंतिम फेरी.

… बार वर वर जात राहतो. १. ८९ मी. पार. १. ९३ मी. पार. १. ९७ मी. पार. २. ०१ मी. पार. २. ०३ मी. पार. २. ०६ मी. पार. सहा उड्या, प्रत्येक वेळी पहिल्याच प्रयत्नात पार. अजिबात डगमगला नाही. दुसऱ्या संधीची गरजच नाही.

… आता बार २. ०८ मी. उंचीवर लावलेला, आशियाई विक्रम. वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी. सुवर्णपदकाचा बार.

… प्रवीण वेगाने धावतो. आपल्या मजबूत पायावर जोर लावतो, झेप घेतो. एका क्षणासाठी तो पॅरिसच्या आकाशात तरंगत असतो, त्याच्या जर्सीवरील तिरंगा दिव्यांच्या प्रकाशात चमकत असतो. तो बारवरून कमान करून उडी मारतो आणि पलीकडे गादीवर उतरतो – सफाईदारपणे.

… आणि बार अजूनही तिथेच आहे – स्थिर.

एकच जल्लोष.

सुवर्णपदक. पॅरिस २०२४ मध्ये भारताचे सहावे सुवर्णपदक. प्रविणने अमेरिकेच्या डेरेक लोक्सिडेंटला २ सेंटिमीटरने हरवले. २०२० पॅरालिम्पिक्सचा इंग्लंडचा सुवर्णपदक विजेता जोनाथन पाचव्या क्रमांकावर फेकला गेलेला.

आणि वयाच्या २१ व्या वर्षी, प्रविण हा मरियाप्पन थंगवेलू यांच्यानंतर पॅरालिम्पिक उंच उडीत सुवर्णपदक जिंकणारा दुसरा भारतीय ठरलेला.

तो आपल्या प्रशिक्षकाला मिठी मारतो. आपल्या खांद्यावर ध्वज गुंडाळतो. ज्या मुलाने काही वर्षांपूर्वी गुगलवर पॅरालिम्पिक्स शोधले होते, त्याने नुकतेच जगाला हरवले होते.

पंतप्रधान मोदींनी ट्विट केले: “इतिहास रचणाऱ्या प्रविणकुमारचा देशाला अभिमान वाटतो. “

२०२५च्या दिल्लीत झालेल्या जागतिक अजिंक्यस्पर्धेत प्रविणने कांस्यपदक मिळवले.

त्याच्या आजवरच्या प्रेरणादायी कामगिरीबद्दल, या वर्षी २०२६ साली, भारत सरकारने “पद्मश्री” पुरस्कार देऊन त्याचा गौरव केला.

खरंच, कधीकधी सर्वात मोठी झेप एका छोट्या क्लिकने सुरू होते.

© श्री मकरंद पिंपुटकर

चिंचवड

मो ८६९८०५३२१५   

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मी प्रवासी ☆ उत्तराखंडमधील एक निसर्गरम्य प्रवास… भाग- ४ ☆ श्री विश्वास विष्णु देशपांडे ☆

श्री विश्वास विष्णु देशपांडे

✈️ मी प्रवासी ✈️

☆ उत्तराखंडमधील एक निसर्गरम्य प्रवास… भाग- ४ ☆ श्री विश्वास विष्णु देशपांडे

आजचा आमच्या सहलीचा पाचवा दिवस होता. कौसानीच्या निसर्गरम्य परिसराचा आज आम्हाला निरोप घ्यायचा होता. निघण्यासाठी मन राजी नव्हते. पण सहलीच्या नियोजित कार्यक्रमानुसार निघावेच लागणार होते. पहाटे लवकर उठून परत एकदा कौसानीचा सुंदर सूर्योदय अनुभवला. ती दिव्य पहाट नेत्रात साठवली. निसर्गातील भव्यतेत आणि सौंदर्यात आपल्याला परमेश्वराचाच साक्षात्कार होत असतो. विविध रूपात तो प्रकट होत असतो. फक्त तो अनुभवता आला पाहिजे. हॉटेल सुमन रॉयल रिसॉर्टच्या खाली असलेल्या बागेत आम्ही परत एक फेरफटका मारला. सहकाऱ्यांसोबत फोटो काढण्याचा आनंद घेतला. नाश्ता घेतला आणि तयार होऊन बसमध्ये बसलो. आज आम्ही रानीखेत या ठिकाणी भेट देऊन पुढे जिम कॉर्बेटला जाणार होतो. आजही दिवसभर प्रवासाची तयारी ठेवावी लागणार होती.

डोंगरातील अरुंद पण निसर्गरम्य रस्त्यातून वाट काढत बस भराभर रानीखेतच्या दिशेने वाटचाल करीत होती. वेळोवेळी आमच्या बस चालकाचे कुशल सारथ्य निदर्शनास येत होते. कौसानी ते रानीखेत अंतर साधारणपणे ५८ किमी असले तरी डोंगराळ आणि अरुंद रस्त्यांमुळे तिथे पोहोचण्यासाठी दोन ते अडीच तास लागतात. राणी पद्मिनी हिच्या नावावरून रानीखेत हे नाव पडल्याचे सांगितले जाते. समुद्र सपाटीपासून सुमारे ६००० फूट उंचीवर वसलेले हे एक शांत आणि निसर्गरम्य असे हिल स्टेशन आहे. उत्तराखंड मधील अलमोडा जिल्ह्यात ते आहे.

इथे कुमाऊं रेजिमेंटचे मुख्यालय आहे. त्याचप्रमाणे आशिया खंडातील सर्वात उंचीवरील उपट गोल्फ कोर्स हे येथील एक प्रमुख आकर्षण आहे. आम्ही गेलो त्या दिवशी मात्र काही कारणाने हे गोल्फ कोर्स बंद होते. त्यामुळे आम्हाला ते पाहता आले नाही. परंतु आमच्या विनंतीनुसार बसने या गोल्फ कोर्स मैदानाला एक फेरी मारली. त्याचा परिसर अतिशय भव्य आणि विशाल असल्याचे त्यातून लक्षात आले.

रानीखेतला त्याचे एक आगळेवेगळे सौंदर्य आहे. सर्वत्र सुंदर हिमालयाच्या शिखरांचे दर्शन घडते. देवदार, बलुत आदी उंचच उंच वाढलेले वृक्ष आपले स्वागत करतात. इथे फिरण्यासाठी अनेक ठिकाणे आहेत. झुलादेवी, मनकामेश्वर, बालाजी आदी मंदिरे आहेत. आम्ही येथील कुमाऊं रेजिमेंट सेंटरला भेट दिली. १९७० च्या दशकात स्थापन झालेले हे एक युद्ध संग्रहालय आहे. येथे कारगिल युद्धाशी संबंधित गोष्टी, कागदपत्रे, ऐतिहासिक शस्त्रे, नाणी आदी गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. कुमाऊं रेजिमेंट मधील आपले शूर सैनिक आणि अधिकारी यांची शौर्यगाथा या ठिकाणी आपल्याला वाचायला, बघायला मिळते. ते पाहिल्यानंतर ऊर अभिमानाने भरून येतो.

हे पाहून झाल्यानंतर आम्ही जिम कॉर्बेटच्या दिशेने निघालो. वाटेत एका ठिकाणी जेवणाचा आनंद घेतला. संध्याकाळी सातच्या सुमारास आम्ही जिम कॉर्बेटला पोहोचलो. हिमालयाच्या पायथ्याशी असलेल्या रामनगर या शहराजवळ हा जिम कॉर्बेट पार्क आहे. इथे आमचा मुक्काम द बनियान रिट्रीट या आलिशान हॉटेलमध्ये होता. या हॉटेलचा परिसर अत्यंत विशाल आणि भव्य आहे. अनेक इमारती आहेत. राहण्याच्या खोल्या, जेवणाचे हॉल, लॉन्स इ. गोष्टी अत्यंत देखण्या आणि प्रेक्षणीय आहेत. इथे पोहोचल्यावर हे सगळे वातावरण पाहूनच आमचा थकवा कुठल्याकुठे पळून गेला. रूमवर जाऊन फ्रेश झालो आणि रात्रीच्या जेवणासाठी जेवणाच्या हॉलमध्ये एकत्र आलो. तो दिवस होता २३ एप्रिलचा. योगायोगाने याच दिवशी माझा वाढदिवस होता. आमचा टूर मॅनेजर अक्षय आणि आमच्या सर्व सहकाऱ्यांनी त्या दिवशी एकत्र येऊन मला शुभेच्छा दिल्या. एका आगळ्यावेगळ्या वातावरणात वाढदिवस साजरा झाला. दुसऱ्या दिवशी सकाळी साडेपाचलाच जिम कॉर्बेटच्या जंगल सफारीसाठी जायचे होते. जिम कॉर्बेटचे जंगल कसे असेल, तिथे कोणते प्राणी दृष्टीस पडतील या गोष्टींची उत्सुकता होतीच. या विचारात केव्हा झोप लागली ते कळलेच नाही. 

– क्रमशः भाग चौथा 

©️ श्री विश्वास विष्णु देशपांडे 

चाळीसगाव.

 प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ कट्टी-बट्टी – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – दीप्ती गौतम ☆

सौ. दीप्ती गौतम

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ कट्टी-बट्टी – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – दीप्ती गौतम

कट्टी आणि बट्टी दोन साधे शब्द, पण मानसिक स्वास्थ्याच्या दोन गुरू किल्ल्या!

आपल्या सगळ्यांच्या बालपणात हे दोन शब्द आपल्या आयुष्याचा भाग नक्की असायचे.

 

कट्टी म्हणजे आपला पहिला emotional withdrawal.

 

ना भांडण, ना आरडाओरड, ना मोठं स्पष्टीकरण…

फक्त शांतिपूर्वक घेतलेली तात्पुरती माघार.. …

“मला तुझ्याशी बोलायचे नाही.”

 

त्याचा साधा अर्थ होता,

“मी दुखावलो आहे… पण ते कसं सांगायचं कळत नाही. ”

 

आणि बट्टी?

ती म्हणजे दुरुस्ती.

थोडी awkward असायची..

थोडी न बोलता झाली, तरी पण लगेच व्हायची…

 आपलं मन शांत झाले की लगेच..

 

ना माफीची गरज,

ना कुठले स्पष्टीकरण…

 

एक चॉकलेट शेअर व्हायचे,

एक चोरटे हसू यायचे…

एक “चल ना, जाऊ दे ना”

आणि सगळं पुन्हा मस्त!

 

लहानपणी आपण emotional regulation चांगले करायचो…

फक्त हा शब्द माहीत नव्हता.

पण शरीराने, वयाने मोठे होताना, मनाचा मोठेपणा मात्र लहान होत गेला…

 

आता मोठेपणी कट्टी झाली की,

Emotional distance,

Ghosting,

थंड responses,

लांबलेला आणि अहंकाराच्या खांद्यावर बसलेला अबोला…

न वाचलेले मेसेज,

कधीकधी वरवरची नम्रता,

कोरडे बोलणे…

 

आणि बट्टी?

ती मात्र कठीण होत गेली,

बर्‍याचदा झालीच नाही..

निरागसपणा गेला,

अहंकार आला,

आणि अबोला कायम त्याच्या खांद्यावर घर करून बसला…

 

आपण “तू दुखावलंस मला” न म्हणता, बाहेरून

“ठीक आहे” म्हणायला शिकलो …

आणि आतून मात्र त्याच्यापासून दूर चालायला लागलो…

 

आपण वस्तू Repair करायला जसे विसरलो, तसेच उसवलेल्या फाटलेल्या मनालासुद्धा Repair करायला विसरलो.

 

मनात साठवून ठेवायला लागलो..

भावनांच्या जागी हिशेब आणि गणिते ठेवू लागलो…

आणि डोक्याला त्रास नको म्हणून लांब रहायला लागलो..

 

लहानपणी कट्टी ही तात्पुरती असायची, पण मोठेपणी ती कायमची झाली…

 

आपण विसरलो —

कट्टी म्हणजे शिक्षा नव्हती,

फक्त दुखावलेल्या मनाला थोडी space हवी असायची, म्हणून हक्काने घ्यायचो…

 

आणि बट्टी म्हणजे जिंकणं किंवा हरणं नव्हतं, ते होतं पुन्हा आपल्या मूळ स्वभावात येणं..

आपल्या अमूल्य अशा मैत्रीला जगणं…

 

भक्कम नाती ती नसतात, जिथं भांडणं होत नाहीत.

भक्कम नाती ती असतात, जिथं

“बट्टी” अबोल्याला अहंकाराच्या खांद्यावरून खाली घेते आणि पुन्हा एकदा गप्पिष्ट बनविते…

 

मोठं होणं म्हणजे कट्टीला टाळणं नाही, तर बट्टीला कडेवर घ्यायचा मोठेपणा दाखवणं..

 

हेच खरं ‘कटी-बट्टी’चं सौंदर्य!

 

लेखक :अज्ञात

प्रस्तुती : दीप्ती गौतम

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ देवबाभळी… चित्र एक.. काव्ये दोन ☆ रेणुका धनंजय मार्डीकर ☆

रेणुका धनंजय मार्डीकर

?️?  चित्रकाव्य  ?️?

? देवबाभळी… चित्र एक.. काव्ये दोन ? रेणुका धनंजय मार्डीकर ☆

(१) -हळद लागली देवबाभळी

(भावगीत – (वर्ण संख्या २०, यति ११ व्या अक्षरावर))

फुले पखरली अंगांगावर कांचन बहरून आला 

हळद लागली देवबाभळी मधुरीम श्रावण झाला ||ध्रु||

*

पानगळीने एकटीच कधी बांधावर उदासवाणी

पावसऋतूत किती देखणी दिसते जणू महाराणी

वैद्यराज बाभूळ बहुगुणी हिज मानाचा शेला घाला 

हळद लागली देव बाभळी मधुरीम श्रावण झाला ||१||

*

लवलवणारी चिमणी पाती काट्यांचे मोहोळ भरले 

सडा टाकण्या मनमोहकसा कनक जणू पाझरले 

लोलक दिसती झुंबरातले किरणात कोवळ्या माला

हळद लागली देवबाभळी मधुरीम श्रावण झाला ||२||

*

वेडी बाभळ, शमीरूकु कधी बावळ म्हणून रूजली

केसुरडी, किंकरात, कोकई, रामकाठी नावे सजली

सोनरुपाचा मम् गीताने काव्य साज देखणा ल्याला 

हळद लागली देवबाभळी मधुरीम श्रावण झाला ||३||

* * * *

(२) बाभळीत या असे दुवा रे*

(वृत्त : वनहरिणी – मात्रा : ८+८+८+८=३२)

*

बांधावरल्या निर्जन जागी अंगावरती काटे सारे

बाभळ सांगे माझ्यामधले सत्व औषधी सारे घ्या रे ||ध्रु||

*

हिरडीसाठी दातखिळीने बळकट करते तुमच्या दाता

माझ्या शेंगा किती बहुगुणी लोणचे तुम्ही बनवा आता

साली पाने शेळ्या खाती डिंक घालुनी लाडवात रे 

बाभळ सांगे माझ्यामधले सत्व औषधी सारे घ्या रे ||१||

*

काटे घेऊन वावरते मी कधीतरी मी पिवळी होते

लाकूड फाटा बहुउपयोगी दारे खिडक्या त्याच्या देते

माझ्या शेंगा माझा पाला खाणाऱ्यांनो काटक व्हा रे 

बाभळ सांगे माझ्या मधले सत्व औषधी सारे घ्या रे ||२||

*

पाने झडली तरिही देते पांतस्थाला दाट सावली

काटे भरली सर्वांगाला आशिष देते होत माउली 

व्याधी वरती औषध साऱ्या बाभळीत या असे दुवा रे

बाभळ सांगे माझ्यामधले सत्व औषधी सारे घ्या रे ||३||

*

पशुपक्ष्यांची चिवचिव सारी माझ्या अंगा खांद्यावरती 

सुगरण खोपे विणतच जाते फांद्यावरती असंख्य घरटी

सुरक्षीत अन् आश्वासकसे बाहू माझे सावरणारे

बाभळ सांगे माझ्यामधले सत्व औषधी सारे घ्या रे ||४||

© रेणुका धनंजय मार्डीकर

औसा.

मोबा. नं.  ८८५५९१७९१८

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ जय प्रकाश के नवगीत # १४६ ☆ कागज की पतंग ☆ श्री जय प्रकाश श्रीवास्तव ☆

श्री जय प्रकाश श्रीवास्तव

(संस्कारधानी के सुप्रसिद्ध एवं अग्रज साहित्यकार श्री जय प्रकाश श्रीवास्तव जी  के गीत, नवगीत एवं अनुगीत अपनी मौलिकता के लिए सुप्रसिद्ध हैं। आप प्रत्येक बुधवार को साप्ताहिक स्तम्भ  “जय  प्रकाश के नवगीत ”  के अंतर्गत नवगीत आत्मसात कर सकते हैं।  आज प्रस्तुत है आपका एक भावप्रवण एवं विचारणीय नवगीत “कागज की पतंग”।)

✍ जय प्रकाश के नवगीत # १४६ ☆

☆ कागज की पतंग ☆ श्री जय प्रकाश श्रीवास्तव

पेड़ पर लटकी हुई है

एक काग़ज़ की पतंग।

 

डोर कच्ची थी

समय ने तोड़ दी

हवाओं ने दिशा

उसकी मोड़ दी

राह से भटकी हुई है

एक उच्छल सी उमंग।

 

उछलता बचपन

बजाता तालियाँ

हँसी फूलों सी

विचरती तितलियाँ

आस में अटकी हुई है

साँस भर उठती तरंग।

 

हौसले सबके

नचें इक डोर पर

होड़ बादल से

रुके सब छोर पर

जिंदगी बहकी हुई है

उम्र के उड़ते विहंग। 

***

© श्री जय प्रकाश श्रीवास्तव

२८.१.२६

सम्पर्क : आई.सी. 5, सैनिक सोसायटी शक्ति नगर, जबलपुर, (म.प्र.)

मो.07869193927,

संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ ≈

Please share your Post !

Shares