मराठी साहित्य – विविधा ☆ मला समजलेली संत तुकारामांची अभंग गाथा… भाग – ३२ ☆ अरुणा मुल्हेरकर ☆

अरुणा मुल्हेरकर

? विविधा ?

☆ मला समजलेली संत तुकारामांची अभंग गाथा… भाग – ३२ ☆ अरुणा मुल्हेरकर ☆

समर्पण (२)

पांडुरंगाची भक्ती करताना संत तुकाराम भगवंताच्या पायी लीन झाले आहेत, त्यांची देह बुद्धी नष्ट होऊन परमेश्वराशी त्यांनी स्वतःला कसे समर्पित केले आहे याविषयीचे काही अभंग मागील लेखात आपण पाहिले. आज आणखी काही अभंगांचा परामर्श घेऊ.

महाराजांना चोहीकडे एका परमेश्वराचेच रूप दिसत आहे, त्याचाच आवाज त्याला ऐकू येत आहे. ते देवाला म्हणतात…

ध्याईन तुझे रूप/ गाईन तुझे नाम/

आन न करी काम/ जिव्हा मुखे//

पाहिन तुझे पाय/ ठेवीन मी डोई/

पृथक ते काही/ न करी आन//

तुझेचि गुण नाद/ आईकेन कानी/

आणिकांची वाणी/ पुरे आता//

करीन मी सेवा करे/ चालेन मी पायी/

आणिक न वजे ठायी/ तुजविण//

तुका म्हणे जीव/ ठेवीन मी पायी/

आणिक ते काही/ देऊ कवणा//

हे देवा मी सदैव तुझेच रूप माझ्या डोळ्याने पाहत राहीन आणि तुझेच नाम सतत गात राहीन. माझ्या जिभेवर दुसरे काहीच येणार नाही. माझ्या डोळ्यांनी फक्त तुझे पाय मी पाहीन आणि त्यावरच माझे मस्तक ठेवीन.

त्याशिवाय दुसरे काही करणार नाही. तुझे गुणगान ऐकत राहीन, बाकी काही बडबड करणार नाही. तुझ्याकडे पायी चालत येईन आणि या माझ्या हाताने तुझी सेवा करीन. तुला सोडून दुसरीकडे कोठेही मी जाणार नाही. हा माझा जीव तुझ्या चरणी अर्पण करीन. आता दुसऱ्या कुणाला देण्यासाठी माझ्याकडे काही उरले नाही. हरीनामा- व्यतिरिक्त तुकारामांकडे काही नव्हते, ते हरिमय झाले होते.

एका विठू माऊलीला शरण गेल्याने भक्ताचा कसा फायदा होतो ते महाराज या अभंगात सांगत आहेत.

भावे ऐसा नाश/ अवघिया  दिला त्रास/

अविटाचा केला संग / सर्व भोगी पांडुरंग//

आइताच पाक/ संयोगाचा सकळीका/

तुका म्हणे धणी / सीमा राहिली होऊनी//

आज पर्यंत मी दुसऱ्यांना जो काही त्रास दिला असेल आणि त्यामुळे मला जे पाप लागले असेल, ते या पांडुरंगाला शरण गेल्यामुळे आता नष्ट होईल. कारण त्याच्या अवीट भक्तीमुळे मला त्याचा संग लागला आहे आणि माझी सर्व सुखदुःखे तो एक पांडुरंग आता भोगत आहे. तुकाराम महाराजांना हेच सांगायचे आहे की हरिभक्तीत लीन झाल्यामुळे भक्ताला सुखदुःखाची जाणीव राहत नाही. कोणत्याही परिस्थितीत, चांगली अथवा वाईट त्याचा समभाव राहतो.

तुकाराम सांगतात की अन्नाचा दुष्काळ पडला आहे किंवा त्यांना फार भूक लागली आहे म्हणून ते अन्न सेवन करत नाहीत, तर सर्वसाक्षी जनार्दनाचा मान राखण्यासाठी ते भोजन करतात. बालका बरोबर जर ते जेवावयास बसले तर त्यांना असे जाणवते की आमचा पिताच आम्हाला मोठ्या प्रेमाने भरवीत आहे.

चांगली आणि वाईट दोन्ही कर्मे जेथे जळून जातात ते आत्मपद महाराजांना प्राप्त झाले आहे. मी कोणी नसून कर्ता- करविता तोच एक नियंता आहे याची अनुभूती त्यांना आलेली आहे.

तुकारामांच्या मनाची ही अवस्था ते या अभंगातून कशी व्यक्त करत आहेत ते बघा.

जे जे काही करितो देवा/ ते ते सेवा समर्पे//

भेद नाही सर्वात्मना/ नारायणा तुज मज //

आम्ही दुजे नेणो कोणा/ हेचि मना मन साक्ष/

तुका म्हणे जगन्नाथा/ हे अन्यथा नव्हे की//

ते जे जे काही कर्म करतात ते ते सर्व एका नारायणाला समर्पित करायचे या एका मनोभूमीकेतून. सर्वात्मक सर्वेश्वर आणि तुकाराम महाराज स्वतः यात तो आणि मी असा जराही भेद आता राहिलेला नाही. त्यांचे मनच या स्थितीला साक्षी आहे. ते पुन्हा पुन्हा सांगतात, ” हे जगन्नाथा, मी हे जे सांगतो आहे ते पूर्ण सत्य आहे, यात जराही खोटेपणा नाही.”

लोहचुंबकाच्या बळे/ उभे राहिले निराळे/

तैसा तूचि आम्हा ठाई/ खेळतासी अंतर्बाही //

भक्ष अग्नीचा तो दोरा/ त्यासी वाचवी मोहरा/

तुका म्हणे अधीलपणे/ नेली लाकडे चंदने//

नारायणाच्या संगतीने भक्त कसा परमेश्वराशी एकरूप होतो हे तुकाराम महाराजांनी वरील अभंगात काही उदाहरणे देऊन स्पष्ट केले आहे.

चुंबकाच्या आकर्षणाने लोखंडाची सुई उभी राहते, तसा परमेश्वर भक्तांच्या अंतर्बाह्य उभा आहे. धाग्याचा धर्म आगीने जळण्याचा असतो, परंतु तोच धागा मोहरा नामक खड्याला गुंडाळून अग्नीत टाकला तर जळत नाही. चंदनाच्या संगतीने इतर वृक्षांचे गुणधर्म जाऊन त्यांना चंदनाचा सुगंधी गुण येतो. सत्संग किती महत्त्वाचा आहे ही गोष्ट या उदाहरणांवरून आपल्या लक्षात येते. तात्पर्य, देवाच्या संगतीने भक्त आमुलाग्र बदलतो.

समर्पणाविषयी अनेक अभंग आपल्याला गाथेत आढळतात. मला असे वाटते की या सर्व अभंगांचा आपण अभ्यास करावा. चांगल्या वाचनाने आपल्यावरही चांगले संस्कार होऊन उचित परिणाम होऊ शकतो. यास्तव पुढील लेखात समर्पणाविषयीचे आणखी काही अभंग आपण अवश्य विवेचनासाठी घेऊ.

क्रमशः… ३२

© अरुणा मुल्हेरकर 

डेट्राॅईट (मिशिगन) यू.एस्.ए.

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ “वारी दोन बहिणींची…” ☆ नीता चंद्रकांत कुलकर्णी ☆

नीता कुलकर्णी

☆ “वारी दोन बहिणींची…” ☆ नीता चंद्रकांत कुलकर्णी

 (एक सत्यकथा)

माईची खूप दिवसांपासून इच्छा होती.. एकदा तरी आळंदी.. पंढरपूर पायी वारी करावी. तो सोहळा डोळे भरून पाहावा. दोन मुलं, दोन मुली.. त्यांची शिक्षणं, लग्न, सणंवार.. वारीचा विचार सुध्दा मनात आणता येत नव्हता. संसाराच्या जबाबदाऱ्या पार पाडता पाडता माईच वय झाल होत.. आता कुठलं वारीला जायला जमणार… पंढरीची वारी आपल्या नशिबात नाही. असं म्हणून ती गप्प बसायची. घरीच नाम घेत स्वस्थ बसावं झाल… अशी तिने स्वतःच मनाची समजूत काढली होती.

वारी जवळ आली होती.. त्यामुळे ते दुःख अजूनच जाणवत होते.

मुलाला ती म्हणाली,

“वारी करायची इच्छा अपुरी राहिली.. माझ्या पिंडाला कावळा शिवणार नाही बघ… दर्भाचा करून लावावा लागेल”

 आईच बोलण त्यानी हसून गंमत म्हणून सोडून दिलं. ती आजारी पडेल, तिला झेपणार नाही, त्रास होईल म्हणून घरातले तिला पाठवत नव्हते. तशी ती बऱ्याच वेळा पंढरपूरला बसने गेली होती. पण माईला एकदा तरी पायी वारी करायची होती.

त्या दिवशी रोजच्यासारखी ती संध्याकाळी रामरक्षा म्हणत बसली होती. तिच्या बहिणीचा ठकुचा फोन आला. मुलाने तो उचलला “काय म्हणतेस मावशी बरी आहेस ना”

” हो रे मी बरी आहे. एक आनंदाची बातमी आहे. मी काय सांगते ते नीट ऐक.. माझे अचानक इथल्या दिंडी बरोबर पायी वारीला जायचे ठरले आहे. त्यांनी सगळी सोय केलेली आहे. पाय दुखले तर ट्रक मध्ये बसायची सोय आहे. बरीच वर्ष ते जात आहेत. त्यांना अनुभव आहे. मी माईला पण माझ्याबरोबर घेऊन जाणार आहे. त्यासाठी फोन केला आहे. “एका दमात तीने सांगितले.

मुलगा गोंधळून गेला.

अचानक मावशीनी हे कस काय ठरवल.. त्याला कळेना. ठकुनी पूर्ण माहिती सांगितली. तो म्हणाला.. , “आई-बाबांशी बोलतो आणि मग तुला परत फोन करतो “

त्यांनी मावशी काय म्हणाली ते सगळं सांगितलं. माईला तर खूपच आनंद झाला होता… पण नवरा काय म्हणेल ही चिंता होती..

पंढरीनाथांनी ठकुला फोन लावला म्हणाले, “आता वय झालं माईचं.. तिला कसं झेपेल?”

ठकु म्हणाली, “भाऊजी ती जबाबदारी माझी. आजपर्यंत तिने तुमच्याकडे काही मागितलं नाही. ही तिची शेवटची इच्छा अस समजून.. तिला पाठवा ना हो. “

यावर त्यांना काही बोलता येईना..

“बरं तू इतकी त्या दिंडीच्या लोकांची खात्री देतेस म्हणून पाठवतो. आणि एक सांगतो. पहिल्यांदा जाताय सतत चालणं होणार नाही. ऊगीच थोडं चाला.. मग ट्रकमध्ये बसा. तरच परवानगी देतो. “

“हो.. हो.. “ती म्हणाली.

ते ऐकून माईचा आनंद गगनात मावेना. लहान मुलासारखा तिचा चेहरा फुलला. दोन दिवसात तयारी करून मुलगा तिला मावशीकडे घेऊन गेला.

दारातच तिने ठकुला मिठी मारली दोघींचा गळा दाटून आला. परत जाताना मुलाने बजावले,

” काही त्रास झाला तर कळव. मी तुम्हाला न्यायला येईन” 

ठकुच्या सुनेने त्यांची पूर्ण तयारी करून दिली. दुसऱ्या दिवशी सकाळीच त्यांची दिंडी निघाली. तासाभरात ते आळंदीला पोहोचले. भगव्या पताका फडकत होत्या. पायजमा, पांढरा शर्ट, टोपी, गळ्यात, तुळशीमाळा, टाळं, कपाळावर बुक्का, गंध… असे वारकरी पाहिल्यावर माईला समाधान वाटले. तिच्यासारखा अनेक बायकाही त्यात होत्या. ज्ञानेश्वर महाराजांच्या रथाचं लांबून दर्शन झालं.

माऊलींची पालखी निघायची वेळ झाली होती. ठकु म्हणाली, ” कळसाकडे लक्ष ठेव. पालखी उचलली की तो हलतो असे म्हणतात “

माई स्वतःच आतून हलली होती. देहभान विसरली होती.

 “कळस हलला.. कळस हलला “

अस सगळे ओरडले. तिला नीट दिसल नाही. तिने कळसाकडे हात करून नमस्कार केला.

 दिंडीप्रमुखांनी भगवा झेंडा उभा केला.

” पुंडलिक वरदे हारी विठ्ठल 

श्री ज्ञानदेव तुकाराम 

पंढरीनाथ महाराज की जय” 

असा जय जय कार करत वारकरी त्यांच्या मागून निघाले.

माई ठकुची वारी सुरू झाली..

” पाऊले चालती पंढरीची वाट 

सुखी संसाराची सोडुनिया गाठ “

अभंग, गाणी गात गात.. वाट सरत होती. पावसाची सर येऊन गेली. वारकरी अजून ताजेतवाने झाले. भराभर निघाले. माईच्या दिंडीत एक लेकुरवाळी.. पोरग कडेवर घेऊन निघाली होती. माईला रहावलं नाही तिने विचारलं,

” एवढं लहान लेकरू घेऊन कशी निघालीस ग?”

ती म्हणाली,

“सासूबाईंनी याच्यासाठीच नवस बोलला होता. आळंदी ते पुणे करणार आहे. आणि मग याला एकदम पंढरपूरलाच घेऊन येणार आहे”

काजळ तीट लावलेलं ते सावळं पोरगं माईकडे बघून हसलं..

माईला वाटलं हे किती भाग्यवान.. त्याला लहानपणी वारी घडते आहे.. त्याच्या गालावरून तिने हात फिरवला त्याची पापी घेतली. ते पोरग म्हणजे विठ्ठलाचे छोटे सावळ ध्यान असल्याचा भास तीला झाला. माईला आता विठुरायाचा ध्यास लागला होता.

डोक्यावर पितळी तुळशी वृंदावन घेतलेल्या बाईने.. पाणी पिताना वृंदावन माईच्या हातात दिले. माईच्या मनात आलं एवढं ओझं घेऊन ही म्हातारी चालतीय.. आपल्याला तर मोकळं चालायच. सहज जमेल.. माईच्या पेक्षा म्हाताऱ्या बायका, पुरुष दिंडीत होते. माईला हुरूप आला. ती भराभर पाय उचलायला लागली.

फुलांनी सजवलेल्या रथामागे विठुरायाचा गजर करत चालेले वारकरी… एका मागोमाग एक निघालेल्या दिंड्या सगळ्यांची आस एकच होती. त्या विठुच्या पंढरीला जायचं.. माईच्या डोळ्याचे पारणं फिटलं. पहिला मुक्काम पडला. वारकऱ्यांच्या स्वागताला असंख्य लोक जमले होते. दिंडी प्रमुखांनी स्वयंपाकाची व्यवस्था करून ठेवली होती. झाडाखाली पंगत बसली. पत्रावळी वरच्या त्या साध्या जेवणाला अमृताची चव होती. माई दोन घास जास्तच जेवली. रात्री कशी गाढ झोप लागली.

पहिल्या दिवशी पाय थोडे दुखले. तिकडे लक्ष द्यायला सवड नव्हती. पालखी पुढे जात होती. पाय आपोआप वाट चालत होते.

दोघींनी ठरवले की मधून मधून एक, दोन टप्पे ट्रक मध्ये बसून जायचे. म्हणजे पुढचा आनंद घेता येईल. घरच्यांनाही काळजी नको.

एकदा पहाटेच माईला जाग आली. वारकऱ्यांची लगबग सुरू झाली होती. माई पालखी जवळ गेली. भक्तीभावानी तिनी पादुकांवर डोकं टेकवलं. त्या क्षणी तिचं देहभान हरपलं होतं. हे अनुपम सुख डोळे भरून पहायला मिळाले जवळून दर्शन झाले… शांतपणे एकटक बघत ती उभी होती…

याच्यापुढे आता काही नको असे तिला वाटत होते…

” भेटी लागी जीवा लागलीसे आस” म्हणत वारी पुढे चालली होती. पंढरी राया जवळ येत चालला होता. रिंगण बघण्यासारखं असतं. हे इतके दिवस माई नुसत ऐकून होती. आज प्रत्यक्ष बघणार होती. गळ्यात हार घातलेला पांढराशुभ्र अश्व तयार होता. वारकऱ्यांनी रिंगण तयार केलं. इशारा झाला.. त्या क्षणी अश्वांनी पळायला सुरुवात केली. त्यांचा रुबाब, वेग बघण्यासारखा होता. टाळांचा गजर सुरू होता. रिंगणभर फिरून अश्व थेट पालखी समोर जाऊन उभा राहिला.

त्याच्या पायाखालची माती बुक्या सारखी वारकऱ्यांनी कपाळाला लावली. त्यादिवशी सर्वांना ऊत्साह वाटत होता. जल्लोष सुरू झाला. वातावरण चैतन्यमय झाले होते.

बायकांनी फुगड्या घालायला सुरुवात केली. एक जण म्हणाली,

” बहिणाबाई उठा.. नुसत्या काय बसलाय.. घाला फुगडी”

माईनी ठकुचा हात धरून तिला उठवलं आणि दोघींनी खूप वर्षांनी फुगडी घातली. निर्मळ, सात्विक आनंद बहिणी घेत होत्या.

बायका घरदार, संसार ताप दुःख, विसरल्या होत्या. घराबाहेर मोकळ्या रानात मुक्तपणे गात होत्या. त्या विठ्ठलाने बायकांच्या मनावर गारुड केलं होतं.

दुसऱ्या दिवशीच्या मुक्कामात टाळ आणि चिपळ्यांच्या साथीवर वारकऱ्यांनी भजनं म्हणायला सुरुवात केली.

” विठ्ठल विसावा सुखाची सावली प्रेमे पान्हा घाली भक्तावरी, रूप पाहता लोचनी, संपत्ती सोहळा न आवडे मनाला लागला टकोळा पंढरीसी.. “

माई आणि ठकु रंगून गेल्या होत्या. रात्र झाली तशी ठकु म्हणाली,

 ” माई तू झोपतेस का? अजून बरंच चालायचं आहे. “

” ऐकू दे ग… घरी गेल्यावर झोपायचंच आहे.. काही होत नाही मला”. खरोखर माईला देहाचा विसर पडला होता.

वाखरीला पालखी पोचली.

पंढरपूर जवळ आल होतं. चंद्रभागेत स्नान झालं… कृतकृत्य वाटलं.

लांबून सर्वांनी कळसाचं दर्शन घेतलं. जणु विठुरायाच भेटला असे सर्वांना वाटले. प्रत्येकाचे डोळे भरून आले होते.

गच्च गर्दीत माई स्वतःशी हरवली होती. वारीची सांगता झाली होती. हुरहुर वाटत होती. मन इथेच अडकलं होतं. संसारात जायला नको म्हणत होतं. अजून काही दिवस इथेच राहावं असं तिला वाटत होतं. जाताना मुलगा न्यायला येणार होता.

दिंडीप्रमुख आले. निरोपानिरोपी सुरू झाली. बायका तर एका कुटुंबातल्या सारख्या झाल्या होत्या. लेकुरवाळी पोराला घेऊन आली होती. माईनी लेकराला जवळ घेतले. पोरगं खुशीत हसत होतं.. त्याची आई म्हणाली,

” माई आता पुढच्या वारीला येताल तेव्हा माझा ज्ञानोबा चालायला लागला असेल. “

“हो ग.. ” 

तुळशी वृंदावन घेतलेली म्हातारी म्हणाली, ” माऊली आता आपली भेट एका वर्षानी. किती छान झाली आपली वारी. पुढच्या वर्षी पण आपण असच एकत्र जायचं.. “

बोलताना तिचा गळा दाटून आला होता.

त्यांचं बोलणं ऐकून माईला आतून हलल्यासारखं झालं…

म्हणजे…

वारी संपली कुठे होती? आता तर सुरू झाली होती…

अरे.. खरचं की

माई म्हणाली,

” ठकु आता होईल तोपर्यंत वारी करायची.. जमेल तेवढं चालायच.. दमलो तर ट्रकमध्ये बसायच… “

ठकुनी माईला जवळ घेतलं…

दोघींचे डोळे वाहत होते…

 ” मन शांत होता पुन्हा लागे ओढ” 

या अवस्थेत दोघी बहिणी घरी निघाल्या…

 पुढच्या वर्षी वारीला यायचं हे ठरवूनच…

© नीता चंद्रकांत कुलकर्णी

मो 9763631255

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ‘नाझ’ आहे तुझ्यावर ! ☆ श्री संदीप काळे ☆

श्री संदीप काळे

??

☆ “‘नाझ’ आहे तुझ्यावर !” ☆ श्री संदीप काळे ☆

मी जयपूरच्या विमानतळावर उतरलो. एरवी सरफरोश, कच्चे धागे अशा चित्रपटांतून पाहिलेल्या राजस्थानच्या भूमीवर मी आज पहिल्यांदाच पाऊल ठेवले. अनेक शूरवीरांच्या पदस्पर्शाने ऐतिहासिक ठरलेल्या, ‘त्या’ भूमीवर पाय ठेवताक्षणी मी त्या भूमीला वंदन केले. विमानतळावर मला घेण्यासाठी ‘व्हॉईस ऑफ मीडिया’चे राजस्थान राज्याचे प्रदेशाध्यक्ष गोपाल गुप्ता आणि त्यांची सर्व टीम हार-तुऱ्यांसह आली होती. हॉटेलवर पोहचण्यासाठी रात्रीचे अकरा वाजले. तेवढ्या रात्री उद्या जयपुरात होणाऱ्या ‘व्हॉईस ऑफ मीडिया’च्या राज्य अधिवेशनाच्या तयारीची बैठक घेण्यासाठी सर्व सहकारी तयार होते. बैठक झाली. अध्यक्ष आणि सर्व पदाधिकारी गेल्यावर मी घड्याळाकडे पाहिले. रात्रीचा एक वाजला होता.

उद्याच्या कार्यक्रमाचे चिंतन करत मी अंथरुणावर पडलो होतो, पण झोप काही लागेना. मी सकाळी सातपासून एवढी पळापळ केली तरी, झोप का लागत नाही? याचा विचार मी करत होतो. तेव्हा माझ्या लक्षात आले, की मुंबईत डॉ. मीना जोशीकाकू धर्माबाद येथून आल्या होत्या. त्यांच्या गडबडीत व्यंकटेश जोशीकाका यांनी मला जेवूच घातले नाही. मी त्यांच्यासोबतच फिरत होतो. मुंबईच्या हॉटेल वेलकमपासून ते जयपूरमधल्या हॉटेलपर्यंतचा माझा प्रवास कमालीचा पळापळीचा होता. मी हॉटेलच्या रिशेप्शनचा फोन डायल केला. त्यांना जेवणाविषयी बोललो. त्यांनी मला सांगितले, किचन अकरा वाजताच बंद झाले आहे. माझ्यापुढे दुसरा पर्यायच नव्हता. मी जेवणासाठी ऑनलाईन पार्सल मागविले. खाली काऊंटरवर आलो. दरवाजा उघडून बाहेर पाहिले, तर जोरदार पाऊस चालू होता. रस्त्याने गुडघाभर पाणी वाहत होते. अर्ध्या तासाने, तेवढ्या पावसातही माझे पार्सल आले.

पार्सल देणाऱ्या व्यक्तीने मला पार्सल दिले. पाऊस केव्हा कमी होईल, याची तो माणूस वाट पाहत होता. इतक्यात हॉटेलमध्ये साफसफाई करणाऱ्या माणसाला जाग आली आणि तो पार्सल आणलेल्या व्यक्तीला पाहत म्हणाला, ‘अरे ‘नाझ’, तू अजून घरी गेला नाहीस का? अजून इथेच कसा?’

त्याने सांगितले, ‘नाही, निघालो होतो. येथे असलेल्या साहेबांची ऑर्डर होती. होम डिलेव्हरी देणारी मुले घरी गेली होती. त्यामुळे मलाच यावे लागले. आता पार्सल देऊन घरी निघावे म्हटले, तर जोरदार पाऊस सुरू झाला’. अचानक लाईट गेली. साफसफाई करणाऱ्या माणसाने मेणबत्ती लावली. आम्ही तिघेजण त्या मेणबत्तीच्या उजेडात बसलो. पाऊस काही थांबत नव्हता. लाईट कधी येणार आहे, हे माहिती नव्हते. मी तिथेच जेवणाचे पार्सल उघडले आणि जेवायला सुरुवात केली. त्या दोघांनाही मी जेवण्यासाठी आग्रह करीत होतो. पण ते दोघेही जेवत नव्हते. मी जेवत जेवत बोलायला सुरुवात केली.

‘नाझ’ हे नाव मी पहिल्यांदाच ऐकत होतो. खूप सुंदर नाव आहे. ‘आमच्याकडे मुलाचे नाव लहानपणी मुलाची आत्या ठेवते. तुमच्यामध्ये कोण ठेवते?’ असे मी त्या पार्सल घेऊन आलेल्या व्यक्तीला विचारले. त्यावर हॉटेलमध्ये सफाई करणारा आणि ‘नाझ’ दोघे एकमेकांकडे पाहत होते. त्यांनी मला ऊत्तर दिलेच नाही. आमचे बोलणे चालूच होते. बोलण्यातून एकएक करून अनेक विषय समोर येत होते. माझ्यासमोर बसलेले ते दोघेजण हातचे राखून बोलत होते. त्यांच्या बोलण्यातून एक विषय पुढे आला, तो म्हणजे राजस्थानात गरिबी एवढी चिकटली आहे की, त्यातून बाहेर पडणे पिढ्यानपिढ्या शक्य नाही. तोच सफाई करणाऱ्या सोयबला कुणीतरी आवाज दिला, म्हणून तो बाहेर गेला. त्यानंतर मी आणि ‘नाझ’ बोलत बसलो. ‘नाझ’ हे कमालीचे वेगळेपण असलेले व्यक्तिमत्त्व होते. कसली सामाजिक आणि आर्थिक चिंता नाही. तो बिनधास्त जगतोय, अगदी जगाची पर्वा न करता! अनेकांना सोबत घेऊन.

मी जयपूरच्या मयूर हॉटेलमध्ये थांबलो होतो, त्या हॉटेलपासून अगदी जवळच नाझ राहतोय. तिथे त्याचे आणि त्याच्या मित्राचे एक छोटेसे हॉटेल आहे. जयपूरमध्ये लहानाचे मोठे होताना ‘नाझ’ने जे भोगले होते, ते खरे तर कुणाच्याही वाट्याला येऊ नये, असेच होते. पण त्यातून तो एवढा आनंदी आणि समाधानी आहे की, त्याच्यासारख्या अनेकांनी आदर्श घेतला पाहिजे.

‘नाझ’ची कहाणी सुरू होते, एका अशा गल्लीत, जिथे जाणे म्हणजे सामाजिक स्वास्थ्याच्या विरुद्ध मानले जाते. ‘नाझ’ची आई सुलताना देहविक्रीचे काम करायची. जेव्हा ‘नाझ’चा जन्म झाला, तेव्हा सुलताना हिने ठरवले की, आता हा व्यवसाय सोडून आपण दूर कुठे तरी नव्याने आयुष्य सुरू करायचे. ‘ती’ त्या दलदलीतून बाहेर पडली. तिने तिचे नवीन आयुष्य सुरू केले. सुलताना हिने कधीही ‘नाझ’च्या बाबतीत कुणालाही खोटे सांगितले नाही. पण त्याचे परिणाम ‘नाझ’ला भोगावे लागले. ‘नाझ’ त्यातून बरेच काही शिकला.

तो माझ्याशी बोलताना म्हणाला, ‘मला बाप नाही, हे माझ्या आसपास असलेल्या लोकांना खूप खटकते. मला बाप नाही, मी बिनबापाचा जन्मलो, हा विषय ते सतत काढत असतात. मला जे विचारतात, त्यांच्या आयुष्याकडे जेव्हा मी बारकाईने पाहतो, तेव्हा माझ्या लक्षात येते की, त्या व्यक्तीचे आणि त्याच्या वडिलांचे आयुष्यभर कधीच पटले नाही. अनेकांना वडील आहेत, पण त्यांनी त्या वडिलांना वृद्धाश्रमात ठेवलं आहे. अनेकांना वडील असून ते त्यांच्या सोबत राहत नाहीत. अनेकांना वडील आहेत, पण ते त्यांच्याशी बोलत नाहीत. दुरावा आणि दुरावा हे त्या अनेक मुलांना जसे लागू होते, तसे बापांनाही लागू होते. वडील आणि मुलगा, मुलगा आणि वडील या दोघांमधले नाते किती ठिकाणी चांगले राहते? ते कसे वाईट आहे? याचे अनेक दाखले मला ‘नाझ’ने दिले.

‘नाझ’ म्हणाला, ‘आम्ही ज्या मुस्लिम गल्लीत राहत होतो, तिथे मी लहान असताना सर्व मित्र मला ‘ये नाझयज औलाँद है’ म्हणून चिडवायचे. मी माझ्या ओळखीच्या मौलवींकडे याबाबत तक्रार केली. त्यावर मौलवी मला हसून म्हणाले, ‘तू नशीबवान आहेस. तुझ्यामुळे कुणाला तरी असुरी आनंद घेता येतो. हे चांगले आहे. तूही सर्वांना सांग, अगदी अभिमानाने, माझे नाव ‘नाझ’ आहे. ‘नाझ’ म्हणजे अभिमान, ‘नाझ’ म्हणजे आपलेपण. अरे, या जगात कुणी बिनबापाचा नसतो. सर्वांचा बाप अल्लाह आहे. कुणीही येथे पोरका नाही’.

मौलवीच्या सांगण्यानंतर माझ्याआधी माझ्या मित्रांनी माझे नाव सगळ्या गल्लीला सांगितले. माझ्या अगोदर माझे नवे नाव कुणीतरी अम्माला जाऊन सांगितले.

‘नाझायज’चा ‘नाझ’ आता सर्वांसाठी आदर्श ठरला आहे. ‘नाझ’ने स्वतःचे हॉटेल सुरू केले आहे. तिथे अनेक माणसे काम करतात. ‘नाझ’ आणि मौलवी यांच्यातील नाते आता खूप छान झाले होते. मौलवींच्या मदतीने ‘नाझ’ने अम्मासह अनेकांच्या मदतीने ‘नाझ’सारखी असलेली अनेक मुले शोधून काढली. त्यांचे समुपदेशन करत त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणले. त्या सर्व मुलांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यातून आलेले अनुभव आणि मिळालेले नाव यावर ‘नाझ’ माझ्याशी खूप भरभरून बोलत होता. ‘नाझ’ची पत्नी रेश्मा ‘सलोखा’ नावाची सामाजिक संस्था चालवते. ‘नाझ’चे सामाजिक काम पाहून रेश्मा ‘नाझ’सोबत लग्न करण्यासाठी तयार झाली. या दोघांना रुक्साना, सरिता आणि विजयमाला अशा तीन मुली आहेत. त्या तिन्ही मुली इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकतात. त्यांचा प्रथम येण्याचा क्रम दरवर्षी ठरलेला असतो.

मी ‘नाझ’ ला म्हणालो, ‘ही नावे अशी वेगवगेळी का ठेवली?’

‘नाझ’ म्हणाला, ‘आम्ही अशी नावे मुद्दामच ठेवली आहेत. मी आणि रेश्माने कधी आपला धर्म एकमेकांवर लादला नाही’.

आम्ही गप्पांमध्ये एवढे रमलो की, बाहेर पावसाची रिपरिप थांबली, हे आमच्या लक्षातच आले नाही. ‘नाझ’ बाहेर गेला. त्याने पाहिले की आता पाऊस थांबला आहे. ‘मी निघतो’ म्हणत ‘नाझ’ निघाला. नेमकेच जेवण झाले आहे. चला शतपावली करू, या उद्देशाने मीही ‘नाझ’सोबत बाहेर पडलो.

‘नाझ’ने बॅग गाडीला अडकवली आणि आम्ही जयपूरच्या ‘त्या’ रस्त्याने गपा मारत फिरत होतो. मध्येमध्ये आकाशातून पावसाचे थेंब अंगावर पडत होते. आकाशातले ते पाणी जेवढे स्वच्छ होते, तेवढीच ‘नाझ’ची इमानदारी, वर्तन आणि माणुसकी स्वच्छ होती. मेहनतीतून कमवायचे, निराधार मुलांना रस्ता दाखवायचा, कुटुंबाच्या मागे खंबीरपणे उभे राहायचे, लोकांना रोजगार देण्यासाठी पुढाकार घ्यायचा, सामाजिक ‘सलोख्या’साठी प्रयत्न करायचे, असे अनेक उपक्रम ‘नाझ’ आणि त्यांच्या पत्नी रेश्मा दोघे मिळून चालवत होते.

मी ‘नाझ’ला म्हणालो, ‘आता रात्र खूप झाली आहे. आपण परत हॉटेलच्या दिशेने निघूया’. त्यावर ‘नाझ’ विनंती करत म्हणाला, ‘साहेब, अगदी बाजूलाच माझे घर आहे. आपण पाच मिनिटांसाठी आलात, तर बरे होईल’.

मी होकारार्थी मान हलवली. आम्ही ‘नाझ’च्या घरी गेलो. आम्ही घरी येतोय हे ‘नाझ’ने अगोदरच घरी सांगितले होते. ‘नाझ’च्या आईने दरवाजा उघडला. ‘नाझ’ची रेशमाही आमची वाट पाहत होती. छोटेसे, पण अत्यंत नीटनेटके घर. त्या घरात मंदिर आणि मज्जितमधील ‘देवपण’ समसमान दिसत होते. ‘नाझ’, ‘नाझ’ची आई सुलताना, ‘नाझ’ची पत्नी रेश्मा यांच्यासोबत माझ्या खूप गप्पा झाल्या.

सुलताना म्हणाल्या, ‘माझ्या मुलाने, माझ्यामुळे खूप भोगले आहे. त्यातून तो आता सावरला आहे. ज्याचा त्याला त्रास व्हायचा, राग येत होता, त्यातून त्याने सावरून मौलवीच्या मदतीने खूप मोठे काम उभे केले. ‘नाझ’ लहान असताना मुले त्याला चिडवायची, तू ‘नाझायज औलाद हैं’ असे म्हणायची. त्यावर ‘नाझ’ घरात येऊन स्वतःला एका खोलीत कोंडून घ्यायचा. मी त्याला समजून सांगायची. त्यावर तो ओरडून मला विचारायचा, ‘खरं सांग, माझा बाप कोण आहे?’

तो जसाजसा मोठा गेला, तशी त्याच्या प्रश्नांची उत्तरे मिळत गेली’. ‘नाझ’कडे पाहत सुलताना म्हणाली, ‘माझ्या ‘नाझ’चा मला अभिमान आहे. ‘नाझ’ने कित्येकांच्या आयुष्यात सोनेरी सामाजिक पहाट आणून दिली.

‘नाझ’च्या गालावरून हात फिरवत सुलतान म्हणाली, ‘बेटा, काळजी घे स्वतःची. खूप पळापळ करतोस तू. मुली मोठ्या होत आहेत त्यांची काळजी घे. किती डोळे खोल गेलेत तुझे’ असे म्हणताना सुलतानाच्या डोळ्यांत पाणी आले. सुलतानाने ‘नाझ’ला जवळH’b घेतले. ‘नाझ’ सुलतानाच्या मांडीवर झोपी गेला. सुलताना ‘नाझ’ला थोपटत होती. सुलतानाआईच्या प्रेमाला कोणत्या शब्दांत बांधावे, असे मला झाले होते.

रेश्मा म्हणाली, ‘या जगात असे अनेक ‘नाझ’आहेत, ज्यांना रस्ता दाखवण्याची गरज आहे. नाहीतर ते व्यसनाला जवळ करतात. दरवर्षी एकट्या राजस्थानमध्ये असे ‘नाझ’ वीस हजारापेक्षा जास्त सापडतात. हाच आकडा देशभरात दहा पट आहे. जगभरातल्या ‘नाझ’चा विचार केला, तर अशा ‘नाझ’ची एक मोठी जमात तयार होऊ शकते. यातली साठ टक्क्यांहून अधिक माणसे लोकांच्या बोलण्यामुळे जगणे सोडून देतात आणि उर्वरित चाळीस टक्के लोकांच्या बोलण्याला घाबरून जीव मुठीत धरून जगतात’.

मी घड्याळाकडे पाहिले. रात्र आता संपण्याकडे झुकली होती. मी ‘नाझ’ला म्हणालो, ‘चला ‘नाझ’कुमार, निघावे लागेल मला. तुम्ही तुमच्या आईच्या कुशीत आहात. माझी आई फारच लांब आहे’.

त्यावर दुसऱ्या बाजूने मला सुलताना आईने पकडले आणि मांडीवर झोपवले. सुलताना मला म्हणाली, ‘बाळा, आई शोधा, म्हणजे सहज सापडेल’.

तो क्षण कमालीचा भावनिक होता. मी ‘नाझ’च्या घरातून बाहेर पडलो. सोबत ‘नाझ’ही होता. ‘नाझ’ मला हॉटेलपर्यंत सोडण्यासाठी आला. त्याची गाडी घेऊन तो परत घरी गेला. त्या हॉटेलमध्ये अजून लाईट आली नव्हती. मी विचार करीत होतो, अनेकांच्या आयुष्यात प्रकाश आणणाऱ्या ‘नाझ’ला हाच समाज पूर्वी नावे ठेवत होता. आता हाच समाज ‘नाझ’चा उदो उदो करतो. या समाजाचे खरे रूप काम करणाऱ्या, वेगळेपण जपणाऱ्या, सामाजिक प्रवाहात असणाऱ्या माणसाला कधी दिसले नाही. उलट या टीका करणाऱ्या, बेसुमार वागणाऱ्या माणसांच्या चुकीच्या वागण्यामुळे चांगली माणसे अजून चांगले काम करीत असतील, जसा ‘नाझ’ करतो. सामाजिक स्वास्थ्य ‘यांनी’ बिघडवले, असा ज्यांच्यावर बेसुरी सामाजिक शिक्का बसला, पण त्यांनी सामाजिक स्वास्थ्य खऱ्या अर्थाने सुधारले, असे अनेक ‘नाझ’ आपल्या अवतीभोवती आहेत. त्या ‘नाझ’ला तुम्ही आम्ही सर्वांनी मिळून मदत करणे गरजेचे आहे, बरोबर ना? करणार ना तुम्ही मदत?

 

© श्री संदीप काळे

चीफ एडिटर डायरेक्टर एच जी एन मीडिया हाऊस मुंबई.

व्हाइस ऑफ मिडिया, मुंबई 

मो. 9890098868

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ मैत्री- – -☆ विभावरी कुलकर्णी ☆

विभावरी कुलकर्णी

??

☆ मैत्री– – – ☆ विभावरी कुलकर्णी

किती छोटा शब्द आहे ‘मैत्री’

पण महत्वाचा, अनुभवल्याशिवाय न समजणारा ‘मी’ आणि’ तू’ यांचा मिळून बनतो शब्द ‘मैत्र’

हे मैत्र ज्यांच्यात असते, ती भावना म्हणजे मैत्री’ सर्व भेदांना छेदून जाते ती ‘मैत्री’

एकमेकांबद्दल वाटणारा विश्वास म्हणजे ‘मैत्री’ कोणतीही गोष्ट करताना झालेली आठवण म्हणजे मैत्री’

दोन आत्म्यांना जोडणारे, तरीही मुक्त असणारे बंधन म्हणजे ‘मैत्री’

असे बंधन जे स्थळ, काळ, वेळ, स्त्री, पुरूष सर्वांच्या पलिकडचे..

बंध असूनही बंधनात न ठेवणारे…

सर्व नाती जपूनही नात्यांच्या पलिकडचे… कोणतेच नाते नसूनही सर्व नाती जपणारे-

कोणतीही गोष्ट हक्काने केंव्हाही शेअर करावीशी वाटणे म्हणजे ‘मैत्री’

एकमेकांना समजून घेते. समजावते ती मैत्री’ कोणतीही गोष्ट लपवावीशी वाटत नाही ती ‘मैत्री’

षडरिपुंच्या पलिकडे जाऊन आदर करते ती मैत्री’ 

एकमेकांच्या उणीवांसहित केलेला स्विकार म्हणजे ‘मैत्री’

मनातले न सांगताच समजून घेते ती ‘मैत्री’ 

एकमेकांचा आदर करते. आणि हक्कही गाजवते ती ‘मैत्री’

नशीबवान माणसांनाच लाभते अशी मैत्री खरचं किती छोटा शब्द आहे ‘मैत्री’

© विभावरी कुलकर्णी

मेडिटेशन,हिलिंग मास्टर व समुपदेशक, संगितोपचारक.

सांगवी, पुणे

📱 – ८०८७८१०१९७

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ रक्तमाखली अक्षरे ! ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

☆ दूर राहिलेलं घर  ☆ श्री संभाजी बबन गायके 

लेफ्टनंट जनरल रंजन महाजन साहेब (निवृत्त)

त्या लाकडी पेटीमध्ये नववधूचे वस्त्रालंकार म्हणजे तिच्या भाषेत दुल्हन का जोडा… लाल रंगाचा… आणि इतर ब-याच वस्तू निघाल्या… लग्नाच्या वेळी नवरी अंगावर मोठ्या हौसेने घालते त्या सर्व वस्तू सुद्धा होत्याच. एकक्षणभर त्याच्या डोळ्यांसमोर त्याची बहिण जणू साक्षात उभी राहिली! तिच्या लग्नात ती अशाच पेहरावात सजली होती आणि तो तिच्यामागे तलवार घेऊन उभा होता. लग्नासारख्या आनंदाच्या सोहळ्यात शस्त्रांचं काय काम? त्यानं लहानपणी त्याच्या वडिलांना विचारलं होतं. वडील म्हणाले होते, “इथं राज्य करणा-या लोकांचे सैनिक मांडवात घुसून नवरीला थेट उचलून घेऊन जात… आणि नंतर त्या पुन्हा कधीच नजरेस पडत नसत. म्हणून संरक्षणासाठी, हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी हा तलवारींचा पहारा ठेवावा लागे… नंतर ही प्रथाच पडून गेली!”

“दादा, मला इकडे पाठवू शकाल त्या सा-या वस्तू… आणि तो पोशाख?” फोनवरून पलीकडून थरथरता प्रश्न ऐकून साहेबांच्या हृदयात कालवाकालव झाली! “पत्ता आहेच माझ्याकडे. पाठवण्याची व्यवस्था करतो, ताई!” साहेबांनी असं म्हणत फोन ठेवला. कॅप्टन साहेब म्हणाले, ”यह सभी चीजें अच्छे से pack करके इस address पे जल्द से जल्द भेज दो!” आणि साहेब आपल्या जीपकडे वळाले. त्यांनी एकदा मागे वळून त्या घराकडे पाहिले! 

ती त्या घरात नववधू अगदी काहीच वर्षांपूर्वी आली असावी. दोन मजली घर ते. त्याला खोल तळघरसुद्धा होतं. त्यात बरंच काही साठवून, लपवून किंवा सांभाळून ठेवता यायचं. घरामागे बर्फाने आच्छादलेले पहाड, त्यांवर उंच उंच झाडं. खळाळणारे ओहोळ. सफरचंदाच्या बागांतून पिकू लागलेल्या फळांचा मनमोहक वास. केशर तर इथल्या कणाकणात जणू मिसळून गेलेलं. धुकं असं की वाटे आभाळातून चालतो आहोत आपण. सूर्य उष्णता देणारा एक गोळा आहे, हे इथं कुणाला ठावेच नसावे… इतकी थंडी… दिवस कसे निघून चालले होते ते समजतही नव्हतं! 

एकेदिवशी रात्री घराचा दरवाजा ठोठावत काळ आला… जोडीला हवेत बंदुकीतून डागल्या गेलेल्या गोळ्यांतील दारूचा दर्प होताच. “चला, निघा… नाही तर जीवाला मुकाल!” आवाज आणि चेहरे ओळखीचे होते… पण त्या चेह-यांवरचे डोळे आज अंधारातही चमकत होते… एखाद्या श्वापदाचे चमकतात तसे. ते शब्द खरेच होतील अशी खात्री पटली… कारण शेजारच्या घरांतून प्राणांतिक किंचाळण्याचे आवाज कानांवर आदळत होते… !

जगात राहायचे म्हणजे जिवंत राहण्यास प्राधान्य द्यावे लागते… नेसत्या वस्त्रांनिशी बाहेर पडावं लागलं सर्वांना. जेवताना हातात घेतलेला घास तसाच ताटात टाकून द्यावा लागला… हात धुण्याचीही फुरसत लाभली नाही. सफरचंदाच्या व्यापारासाठी घराबाहेर पडलेले बाप-लेक रात्री घरी आले नव्हते. रस्त्यात अडकून पडले असतील अशी मनाची समजूत घालत सासू-सुना बळेच डोळे मिटून अंथरुणावर पहुडल्या होत्या… आणि त्यात दारावर पडलेल्या त्या थापा! जोडीला मोठ्या आवाजातले दरडावणे!

दिल्लीत पोहोचता पोहोचता जीव कासावीस झाला होता. बाप्या माणसांचा तर अजूनही तपास लागलेला नव्हता. सारी पांगापांग झाली होती… कोण कुठे आहे, कसा आहे, आहे की नाही? सर्व काळोख!

शरणार्थी लोकांसाठी उभारलेल्या तात्पुरत्या तंबूत संसार थाटताना कुंकवाचा करंडा कुठे ठेवावा ते समजत नव्हतं. शेजारच्या तंबूतील मुलीचा नवरा दोन-तीन दिवसांनी परतला होता… रक्तबंबाळ अवस्थेत… पण तिचं कुंकू मजबूत होतं म्हणे! हिचं वाट पाहणं आता कुठं जुनं होऊ पहात होतं. काही दिवसांनी व्यापारानिमित्त ओळख असलेल्या एका सद्गृहस्थाने आसरा दिला.

कॅप्टन साहेबांच्या दलाला आदेश मिळाले… रिकाम्या घरांचा ताबा घ्या… अन्य कुणी घेण्याआधी… आणि त्या घराला आग लावण्यापूर्वी. काही घरांना आगी लावल्या गेल्याही होत्याच. मालकीच्या घरांतून हाकलले गेलेले लवकर परत येण्याची शक्यताही नव्हती… जिथं जगता येणार नाही तिथं राहणार तरी कोण? 

साहेबांनी हे ही घर ताब्यात घेतलं… बंदोबस्त लावला! घरात राहून गेलेल्या चीजवस्तू ताब्यात घेऊन त्याची नोंद घेतली. कुण्या व्यापारी कुटुंबाचं घर असावं… घरात सारं काही नीट, छान होतं. विशेष म्हणजे त्या घरात टेलिफोनही होता. कॅप्टन साहेबांनी सहज तो फोन चालू आहे का ते पाहिलं… तो चालू होता… एस. टी. डी. सुविधेसह.

 घरात काही पावत्या सापडल्या. इथून दिल्लीला सफरचंदे बाजारपेठेत पाठवण्याचा व्यवसाय होता तर या कुटुंबाचा… साहेबांनी त्या पावत्या पाहताच ओळखले. पावतीवर दिल्लीतल्या व्यापा-याचा पत्ता, फोन नंबर छापलेला होता. कॅप्टन साहेबांनी त्या नंबरवर सहज फोन लावला. एका महिलेने फोन घेतला. “कोण?” त्या महिलेने विचारले. साहेब म्हणाले, ”हम इंडियन आर्मी से है… और मैं कॅप्टन… बोल रहा हूं… ” त्यावर महिला म्हणाली, ”साहब, आप तो हमारे घर से बोल रहे है… यह घर हमारा है!” 

 काश्मिरातून रातोरात पलायन कराव्या लागलेल्या हजारो काश्मिरी नागरीकांपैकीच हेही एक कुटुंब होतं. पैसे, चीज वस्तू आणि शेकडो आठवणी मागे ठेवून ही माणसं जीव वाचवून त्यांच्या मालकीच्या घरांतून पळून आलेली होती! 

 कॅप्टन साहेबांनी त्यावर त्या महिलेला परिस्थिती समजावून सांगितली. “तुमच्या घराच्या संरक्षणासाठी आम्ही आहोत” असंही तिला सांगितल्यावर तिने अनेक प्रश्न विचारले. म्हणाली “आमचं घर तुमचं घर समजा… सांभाळा!” आणि खात्री पटल्यावर ती साहेबांना म्हणाली, ”भाईसाहब, माझं एक काम करणार?” साहेब उदगारले… “हां, बहेन… बतावो!”

“आमच्या घराच्या तळघरात जा. तिथे एका कोप-यात फळबागेत फवारण्यासाठीची औषधं ठेवलीत… त्याच्या उजव्या बाजूला खाली एक लाकडी पेटी आहे का बघा… आणि त्या पेटीतील वस्तू मला पाठवून द्या… फार जड नाहीत वस्तू… पण माझा जीव अडकला आहे त्यांत आणि घरी कधी परतण्याची संधी मिळेल… देवास ठाऊक!” 

 साहेब स्वत: त्या दुमजली घराच्या तळघरात गेले. काही सैनिक सोबत घेतले… अंधा-या तळघरात ती लाकडी पेटी सापडायला वेळ लागला… पण अनेक वस्तूंच्या खाली सापडली. पेटीत अगदी निगुतीने सांभाळून ठेवलेला नववधूचा सारा साजश्रुंगार होता. साडीला तर अजूनही लग्नातल्या हळदीचा सुवास येत होता. आभूषणे ख-या सोन्याची नसावीत पण त्यांची चमक सोन्याहून चमकदार होती. पाठवणी करताना कुण्या सुवासिनीने ओटी भरली असावी… ती ओटी तशीच बांधून ठेवलेली होती पदरात! त्या वस्तू म्हणजे एका नववधूच्या जन्म-जन्मांतारीच्या आठवणी होत्या! त्या साडीच्या पदरावर आईच्या मायेची नजाकतदार वेलबुट्टी होती… आणि धागे वडिलांच्या प्रेमाचे… भावा-बहिणींनी तिची पाठवणी करताना आवेगाने मारलेल्या मिठ्या… त्यामुळे पडलेल्या सुरकुत्या अजूनही तशाच होत्या. अग्निफेरे घेताना पदराला त्यांच्या शेल्याशी बांधलेल्या गाठीच्या खुणाही तशाच होत्या!

 साहेबांनी त्या सा-या वस्तू काळजीपूर्वक वर आणल्या. युनिटमध्ये परतले. एक छानसे packing करून घेतले… त्यात एक चलनी नोट आणि शगुनाचे म्हणून एक सुटे नाणेही ठेवले… आणि एक कागद ठेवला… त्यावर लिहिले. ”भावाकडून… धाकट्या बहिणीसाठी! सुखी रहा… कधी न कधी परत या तुमच्या घरी!” 

 पाचव्या दिवशी साहेबांच्या नावाने त्यांच्या कार्यालयात फोन आला… यावेळी पलीकडून तिचाच आवाज होता… ”दादा… !” आणि पुढची काही मिनिटे केवळ शांतता… गालांवरून ओघळणा-या आसवांना जर एखाद्या ओढ्यासारखा खळखळाटी आवाज असता तर बरं झालं असतं… पण आसवांचा तो प्रवाह निमूटपणे खाली ओघळत जात असावा.

काही वेळाने साहेबच म्हणाले, ”सब चीजें बराबर मिल गयी ना? कुछ छूट तो नहीं गया?” त्यावर ती म्हणाली, ”छूट तो सब कुछ गया पिछे… सारी जिंदगी! लेकिन आपने यादें बचा ली मेरी… और इतनी दूर भेज भी दी मेरे लिये!” पुढे ती बरंच काही बोलली… पण शब्द उमटत नव्हते… काही शब्दांना तसा काही अर्थही नव्हता… कारण मनातून जिभेवर आणि तिथून पुढे सरकायला मागून येणा-या शब्दांना जागाच उरली नव्हती… गळ्यात आवंढा गुंतून राहिलेला होता! 

पुढे दिवस उलटत गेले… साहेबांची तिथून दुस-या सीमेवर बदली झाली. तिचं काय झालं माहीत नाही… पण साहेबांच्या मनात नववधूचा तो लाल रंगाचा पेहराव कायमचे रंग भरून गेला! 

साहेबांना खूप दिवसांनी सुट्टी मिळू शकली… गावी पोहोचायला रात्र झाली… घरच्यांशी बोलता बोलता पहाट केंव्हा झाली ते समजलंच नाही. पहाटे गोठ्यांत गाई हंबरत होत्या… भाऊ बहिणीच्या गावाकडे निघायला घराच्या बाहेर पडला! साहेबांनी शहरातून गावाकडे परतताना तिच्यासाठी लाल रंगाची सुंदर साडी आणली होती… ती साडी तिला कधी एकदा देईन… असं साहेबांच्या जीवाला झालं होतं! सैनिकाचं कठोर शरीरातलं हळवं मन पावलांच्याही पुढं धावत निघालं होतं! 

(काश्मिरातील सैनिकी जीवन सुमारे तीन दशके अनुभवलेले लेफ्टनंट जनरल रंजन महाजन साहेब (निवृत्त) यांची मुलाखत ‘The Monks & Warriors’ podcast मध्ये पाहतो आहे. महाजन साहेबांनी या मुलाखतीत एका घटनेचा ओझरता उल्लेख केला आहे. त्यावर आधारीत हा लेख आहे.) 

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ मनातलं महाभारत… ☆ प्राची जोशी ☆

प्राची जोशी

? इंद्रधनुष्य ?

☆ मनातलं महाभारत… ☆ प्राची जोशी ☆

आयुष्यात प्रत्येक माणसाला सल्ला देणारे खूप भेटतात. पण पूर्ण ऐकून घेणारे फार कमी भेटतात. कृष्णाने अर्जुनाला मध्येच थांबवलं नाही. “तू चुकीचा आहेस, ” असंही म्हटलं नाहीं. त्याने त्याला पूर्ण कोसळू दिलं. कारण कधी कधी माणूस पुन्हा उभा राहण्यासाठी आधी पूर्ण कोसळणं गरजेचं असतं. खरा मित्र तुमच्या अश्रुंना लपवत नाही. तो त्यांना वाहू देतो. कारण त्याला माहीत असतं, अश्रू थांबवले तर वेदना आतच राहते.

महाभारत सांगतं, मित्र म्हणजे तुमच्या प्रत्येक निर्णयाला होकार देणारा माणूस नाही. मित्र म्हणजे तुम्ही चुकीच्या दिशेने चालत असताना तुमचा हात पकडून “थांब” असं म्हणण्याचे धैर्य असलेला माणूस. दुर्योधन कर्णाचा मित्र होता. त्याने कर्णाला मान दिला, सन्मान दिला. जगाने नाकारलेल्या माणसाला त्याने स्वीकारलं. म्हणून कर्णाने आयुष्यभर ती मैत्री जपली. पण महाभारत इथेच थांबत नाही. ते एक प्रश्न विचारतं. मैत्री मित्राला वाचवते, की मित्राच्या चुकीलाही वाचवते? कारण दोन्ही गोष्टी सारख्या नसतात.

कृष्णाने अर्जुनासाठी युद्ध लढलं नाही. त्याने अर्जुनाला स्वतःचं युद्ध स्वतः लढायला शिकवलं. हीच महाभारताची मैत्री आहे. जी माणसाला आधार देत नाही, तर त्याला सक्षम करते. आज आपल्याकडे शेकडो संपर्क आहेत. हजारो फॉलोअर्स आहेत. असंख्य शुभेच्छा आहेत. पण एक प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारावा. आपण हरलो तर आपल्या शेजारी कोण बसणार? आपण रडलो तर आपलं मौन कोण ऐकणार? आपण चुकलो तर आपल्याला थांबवणार कोण?

कारण टाळ्या वाजवणारे खूप भेटतात. पण आरसा दाखवणारे फार कमी असतात. भगवद्गीता मैत्रीची व्याख्या लिहित नाही. ती कृष्णाच्या रुपाने ती जगून दाखवते. मित्र तुमच्यासाठी जग बदलत नाही. तो तुमच्या मनातला अंधार बदलतो. मित्र तुमचं दुःख उचलत नाही. तो दुःख उचलण्याइतकं तुम्हाला मजबूत करतो. मित्र तुमच्यासाठी निर्णय घेत नाही. तो तुम्हाला योग्य निर्णय घेण्याइतके शहाणं करतो.

आणि कदाचित याचसाठी महाभारत संपतं. पण कृष्ण आणि अर्जुनाची मैत्री कधीच संपत नाहीं. कारण युद्ध प्रत्येक युगात बदलतं. शस्त्रं बदलतात. रणांगणं बदलतात. माणसं बदलतात. पण प्रत्येक युगाला एका अर्जुनाची गरज असते. आणि प्रत्येक अर्जुनाला… एका कृष्णाची.

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती : प्राची जोशी

मो ९८२२०६५६६६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “आई…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – राधा पै ☆

राधा पै

? वाचताना वेचलेले ?

☆ “आई…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – राधा पै ☆

आज मुलाने नेमकी कोणती खोडी काढली असेल कोण जाणे!

मुख्याध्यापकांनी एका आईला अचानक शाळेत बोलावलं आणि म्हणाले,

“तुमच्या मुलाने आज ‘जर माझ्या आईला एक दिवसाची सुट्टी मिळाली तर…’ या विषयावर असा निबंध लिहिला आहे की संपूर्ण स्टाफरूममध्ये आधी सगळे हसत होते… आणि नंतर सगळ्यांच्या डोळ्यांत पाणी आलं.”

आई घाबरतच खुर्चीवर बसली.

तिला वाटलं, मुलाने काहीतरी मोठी खोडी केली असणार.

मुख्याध्यापकांनी हसत तिच्या हातात वही दिली आणि म्हणाले,

“ही घरी जाऊन वाचू नका… इथेच वाचा.”

वहीच्या पहिल्या पानावर लिहिलं होतं—

“जर माझ्या आईला एक दिवसाची सुट्टी मिळाली तर…”

पूर्वी मला वाटायचं की माझी आई जगातली सर्वात रागीट बाई आहे.

ती सकाळी पाच वाजता उठवते. अभ्यास करायला लावते. डबा पूर्ण संपवला नाही तर ओरडते. उशिरापर्यंत मोबाईल वापरला तर काढून घेते. सुट्टीच्या दिवशीही म्हणते— “खोली आवर.”

मला वाटायचं… काश! माझी आई एक दिवस कुठेतरी निघून जावी.

पण गेल्या सोमवारी आई आजारी पडली. डॉक्टरांनी तिला पूर्ण विश्रांती घ्यायला सांगितली.

त्या दिवशी पहिल्यांदाच आई खरोखरच अंथरुणातून उठली नाही.

सकाळी गजर वाजला… पण माझे केस कुरवाळत “बाळा, शाळेला जायचं नाही का?” असं म्हणायला कोणीच आलं नाही.

मी उशिरा उठलो. युनिफॉर्म इस्त्री केलेला नव्हता. मोजे एका खोलीत, बूट दुसऱ्या खोलीत होते. डबा रिकामाच होता.

बाबा स्वयंपाकघरात उभे होते. त्यांनी पहिल्यांदाच पोळी करण्याचा प्रयत्न केला. पण पोळी गोल न होता भारताचा नकाशाच झाला.

तेव्हा मला पहिल्यांदा जाणवलं की आई एकाच वेळी किती कामं करते.

शाळेतून घरी आलो, तर दारात कोणी वाट पाहत नव्हतं.

आई अंथरुणात होती. तरीही हसत म्हणाली,

“आलास का माझ्या राजा?”

मी म्हणालो, “आई, भूक लागली आहे.”

ती उठण्याचा प्रयत्न करू लागली… पण वेदनेने पुन्हा झोपली.

त्या दिवशी पहिल्यांदाच मी स्वतःसाठी जेवण वाढून घेतलं.

जेवण थंड होतं… पण त्याहून जास्त थंड घर वाटत होतं.

रात्री मी पाहिलं, आईला खूप ताप होता. तरीही ती बाबांना विचारत होती—

“मुलाने दूध पिलं का?”

“गृहपाठ केला का?”

“उद्या त्याची ड्रॉईंगची वही ठेवायला विसरू नका.”

तिला स्वतःच्या औषधांपेक्षा माझी जास्त काळजी होती.

दुसऱ्या दिवशी मी आईचा मोबाईल घेतला.

मला वाटलं त्यात गेम्स असतील.

पण त्यात सर्वात जास्त फोटो माझेच होते.

मी पहिल्यांदा शाळेत गेलो तो फोटो…

मी पहिल्यांदा सायकल चालवली तो फोटो…

मला ताप आला होता तो फोटो…

आईच्या मोबाईलमध्ये तिचा स्वतःचा एकही चांगला फोटो नव्हता.

सगळे फोटो माझेच होते.

त्या दिवशी मला समजलं…

आई स्वतःचं आयुष्य जगत नाही… ती माझं आयुष्य जगत असते.

तिसऱ्या दिवशी मी आईचे पाय दाबले.

ती हसून म्हणाली,

“आज सूर्य पश्चिमेला उगवला की काय?”

मीही हसलो… पण डोळ्यात पाणी होतं.

मला आठवलं…

मी कितीतरी वेळा तिला म्हटलं होतं—

“तुला काहीच येत नाही… तू फक्त ओरडत राहतेस.”

पण खरं तर मला काहीच येत नव्हतं.

माझा शाळेचा शर्ट कपाटात आपोआप येत नाही…

डबा आपोआप भरला जात नाही…

अंथरूण आपोआप आवरत नाही…

माझ्या आवडीचं जेवण आपोआप बनत नाही…

या सगळ्यामागे माझ्या आईची झोप, तिचा वेळ आणि तिचं संपूर्ण आयुष्य असतं.

आता जर देवाने मला विचारलं की जगातलं सर्वात कठीण काम कोणतं?

तर मी म्हणेन— “आई होणं.”

कारण आईला कधीच सुट्टी नसते.

तिला ताप असो… तरी घर चालतंच.

तिला वेदना असोत… तरी मुलांचीच काळजी असते.

तिला रडावंसं वाटत असलं… तरी ती हसत जेवण वाढते.

आता मी देवाला कधीच म्हणणार नाही की माझी आई एक दिवसासाठी कुठेतरी जाऊ दे.

मी फक्त एवढंच म्हणेन—

“देवा… माझं उरलेलं आयुष्यही माझ्या आईला दे.”

“कारण आई घरात असेल… तर छोटंसं घरही स्वर्गासारखं वाटतं.”

निबंध इथेच संपला.

वही हातात धरताना आईचे हात थरथर कापू लागले.

तिच्या डोळ्यातले अश्रू वहीच्या पानांवर पडू लागले.

तिला आठवलं…

गेल्या महिन्यात रागाच्या भरात मुलाने म्हटलं होतं—

“तुला फक्त ओरडताच येतं.”

त्या दिवशी ती रात्रभर रडली होती.

पण आज त्याच मुलाने, कुणीही न सांगता, तिचं संपूर्ण आयुष्य शब्दांत मांडलं होतं.

मुख्याध्यापक हळूच म्हणाले—

“मुलं आपले शब्द ऐकत नाहीत… पण आपला त्याग मात्र नक्की ओळखतात. फक्त त्यांना समजायला थोडा वेळ लागतो.”

आई घरी आली.

मुलगा धावत दारात आला.

यावेळी त्याने काहीच म्हटलं नाही.

फक्त आईला घट्ट मिठी मारली.

आईने त्याच्या डोक्यावरून हात फिरवला.

दोघेही शांत होते…

पण त्या शांततेत हजारो शब्द दडले होते.

त्या दिवशी पहिल्यांदाच मुलाने स्वतःच आपली ताटली उचलली…

स्वतःचे बूट स्वच्छ केले…

आणि रात्री झोपण्यापूर्वी आईजवळ जाऊन म्हणाला—

“आई… आजपासून तुला सुट्टी देणार नाही… पण तुला कामात कधीच एकटंही सोडणार नाही.”

आई हसली.

तिला वाटलं, तिचा सगळा थकवा त्या एका वाक्यात विरघळून गेला.

लक्षात ठेवा…

मुलांना आई-वडिलांची किंमत ते त्यांच्यासाठी सर्व काही करत असताना कळत नाही. ती तेव्हा कळते, जेव्हा तेच हात थकायला लागतात. म्हणून वाट पाहू नका. आजच आपल्या आई-वडिलांजवळ बसा, त्यांचा हात हातात घ्या आणि एवढंच नक्की सांगा— 

“तुम्ही आहात म्हणून माझं जग सुंदर आहे.”

 

लेखक:अज्ञात

प्रस्तुती: राधा पै

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ मित्रत्वाचा सल्ला ! ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

श्री प्रमोद वामन वर्तक  

?️?  चित्रकाव्य  ?️?

? मित्रत्वाचा सल्ला ! ?  श्री प्रमोद वामन वर्तक ☆

 पाऊस धो धो पडतोय 

गाठ पडली बिळात,

विसरला नाहीस नां रे

हरवले तुला खेळात ?

 शर्यतीत गाजर खाऊन

 झोपलास झाडाखाली,

 असं कसं विसरलास

 शर्यत लागल्ये आपली ?

सल्ला देतो तुला मित्रा

गर्वाच घर खाली असतं,

हवा डोक्यात गेली की

बक्षीस हमखास हुकतं !

 इसापनीतीत प्रसिद्ध 

 ससूल्या आपली जोडी,

 हट्ट करून शर्यतीसाठी

 काढू नको परत खोडी !

 काढू नको परत खोडी !

आंतरराष्ट्रीय मैत्री दिनाच्या शुभेच्छा !

© प्रमोद वामन वर्तक

संपर्क – दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.) 400610 

मो – 9892561086 ई-मेल – pradnyavartak3@gmail.com

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – मनन चिंतन ☆ संजय दृष्टि – शिवोऽहम्… (३) ☆ श्री संजय भारद्वाज ☆

श्री संजय भारद्वाज

(श्री संजय भारद्वाज जी – एक गंभीर व्यक्तित्व । जितना गहन अध्ययन उतना ही  गंभीर लेखन।  शब्दशिल्प इतना अद्भुत कि उनका पठन ही शब्दों – वाक्यों का आत्मसात हो जाना है।साहित्य उतना ही गंभीर है जितना उनका चिंतन और उतना ही उनका स्वभाव। संभवतः ये सभी शब्द आपस में संयोग रखते हैं  और जीवन के अनुभव हमारे व्यक्तित्व पर अमिट छाप छोड़ जाते हैं।  हम आपको प्रति रविवार उनके साप्ताहिक स्तम्भ – संजय उवाच शीर्षक  के अंतर्गत उनकी चुनिन्दा रचनाएँ आप तक  पहुँचा रहे हैं। सप्ताह के अन्य दिवसों पर आप उनके मनन चिंतन को  संजय दृष्टि के अंतर्गत पढ़ सकते हैं।)

श्रावण मास निमित्त पुनर्पाठ में पढ़िए ‘निर्वाणषटकम्‘ पर  छह अंकों की यह शृंखला-

? संजय दृष्टि – शिवोऽहम्… (३) ? ?

निर्वाण षटकम् का हर शब्द मनुष्य के अस्तित्व पर हुए सारे अनुसंधानों से आगे की यात्रा कराता है। इसका सार मनुष्य को स्थूल और सूक्ष्म की अवधारणा के परे ले जाकर ऐसे स्थान पर खड़ा कर देता है जहाँ ओर से छोर तक केवल शुद्ध चैतन्य है। वस्तुत: लौकिक अनुभूति की सीमाएँ जहाँ समाप्त होती हैं, वहाँ से निर्वाण षटकम् जन्म लेता है।

तृतीय श्लोक के रूप में जगद्गुरु आदि शंकराचार्य का परिचय और विस्तृत होता है-

न मे द्वेषरागौ न मे लोभमोहौ
मदो नैव मे नैव मात्सर्यभाव:
न धर्मो न चार्थो न कामो न मोक्ष:
चिदानन्दरूपः शिवोऽहम् शिवोऽहम्।।3।।

अर्थात न मुझे द्वेष है, न ही अनुराग। न मुझे लोभ है, न ही मोह। न मुझे अहंकार है, न ही मत्सर या ईर्ष्या की भावना। मैं धर्म, अर्थ, काम और मोक्ष से परे हूँ। मैं सदा शुद्ध आनंदमय चेतन हूँ, मैं शिव हूँ , मैं शिव हूँ।

राग मनुष्य को बाँधता है जबकि द्वेष दूरियाँ उत्पन्न करता है। राग-द्वेष चुंबक के दो विपरीत ध्रुव हैं। चुंबक का अपना चुंबकीय क्षेत्र है। अनेक लोग, समान और विपरीत ध्रुवों के निकट आने से उपजने वाले क्रमश: विकर्षण और आकर्षण तक ही अपना जीवन सीमित कर लेते हैं। यह मनुष्य की क्षमताओं की शोकांतिका है।

इसी तरह मोह ऐसा खूँटा होता है जिससे मनुष्य पहले स्वयं को बाँधता है और फिर मोह मनुष्य को बाँध लेता है। लोभ मनुष्य को सीढ़ी दर सीढ़ी मनुष्यता से नीचे उतारता जाता है। इनसे मुक्त हो पाना लौकिक से अलौकिक होने, तमो गुण से वाया रजो गुण, वाया सतो गुण, गुणातीत होने की यात्रा है।

एक दृष्टांत स्मरण हो आ रहा है। संन्यासी गुरुजी का एक नया-नया शिष्य बना। गुरुजी दैनिक भ्रमण पर निकलते तो उसे भी साथ रखते। कोई न कोई शिक्षा भी देते। आज भी मार्ग में गुरुजी शिष्य को अपरिग्रह की शिक्षा देते चल रहे थे। संन्यास और संचय का विरोधाभास समझा रहे थे। तभी शिष्य ने देखा कि गुरुजी एक छोटे-से गड्ढे के पास रुक गये, मानो गड्ढे में कुछ देख लिया हो। अब गुरुजी ने हाथ से मिट्टी उठा-उठाकर उस गड्ढे को भरना शुरू कर दिया। शिष्य ने झाँककर देखा तो पाया कि गड्ढे में कुछ स्वर्णमुद्राएँ पड़ी हैं और गुरुजी उन्हें मिट्टी से दबा रहे हैं। शिष्य के मन में विचार उठा कि अपरिग्रह की शिक्षा देनेवाले गुरुजी के मन में स्वर्णमुद्राओं को सुरक्षित रखने का विचार क्यों उठा? शिष्य का प्रश्न गुरुजी पढ़ चुके थे। हँसकर बोले, “पीछे आनेवाले किसी पथिक का मन न डोल जाए, इसलिए मैं मिट्टी पर मिट्टी डाल रहा हूँ।”

मिट्टी पर मिट्टी डालने की लौकिक गतिविधि में निहितार्थ गुणातीत होने की अलौकिकता है।

गतिविधि के संदर्भ में देखें तो धर्म, अर्थ, काम, मोक्ष जीवन के चार पुरुषार्थ हैं। इनमें से हर पुरुषार्थ की विवेचना अनेक खंडों के कम से कम एक ग्रंथ की मांग करती है। यदि इनके प्रचलित सामान्य अर्थ तक ही सीमित रहकर भी विचार करें तो धर्म, अर्थ, काम या मोक्ष की लालसा न करना याने इन सब से ऊपर उठकर भीतर विशुद्ध भाव जगना। ‘विशुद्ध’, शब्द लिखना क्षण भर का काम है, विशुद्ध होना जन्म-जन्मांतर की तपस्या का परिणाम है।

परिणाम कहता है कि तुम अनादि हो पर आदि होकर रह जाते हो। तुम अनंत हो पर अपने अंत का साधन स्वयं जुटाते हो। तुम असीम हो पर तन और मन की सीमाओं में बँधे रहना चाहते हो। तुम असंतोष और क्षोभ ओढ़ते हो जबकि तुम परम आनंद हो।

राग, द्वेष, लोभ, मोह, मद, मत्सर, धर्म, अर्थ, काम, मोक्ष इन सब से हटकर अपने अस्तित्व पर ध्यान केंद्रित करो। तुम अनुभव करोगे अपना अनादि रूप, अनुभूति होगी अंतर्निहित ईश्वरीय अंश की, अपने भीतर के चेतन तत्व की। तब शव होने की आशंका समाप्त होने लगेगी, बचेगी केवल संभावना, जो प्रति पल कहेगी ‘शिवोऽहम्।’

?

© संजय भारद्वाज   

अध्यक्ष– हिंदी आंदोलन परिवार सदस्य– हिंदी अध्ययन मंडल, पुणे विश्वविद्यालय, एस.एन.डी.टी. महिला विश्वविद्यालय, न्यू आर्ट्स, कॉमर्स एंड साइंस कॉलेज (स्वायत्त) अहमदनगर संपादक– हम लोग पूर्व सदस्य– महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी ट्रस्टी- जाणीव, ए होम फॉर सीनियर सिटिजन्स ☆ 

मोबाइल– 9890122603

संजयउवाच@डाटामेल.भारत

writersanjay@gmail.com

☆ आपदां अपहर्तारं ☆

🕉️  श्रावण साधना गुरुवार दि. 30 जुलाई से आरंभ होकर शनिवार 28 अगस्त (रक्षाबंधन) तक चलेगी 🕉️

  💥 

इस साधना में-

ॐ नमः शिवाय का मालाजप होगा।

गोस्वामी तुलसीदास रचित रुद्राष्टकम् का पाठ करेंगे।

इस बार हम आदि शंकराचार्य के निर्वाण षटकम् / वैराग्य षटकम् का भी प्रतिदिन कम से कम एक पाठ अवश्य करेंगे।

मालाजप, रुद्राष्टकम्, निर्वाण षटकम् के साथ आत्मपरिष्कार व ध्यानसाधना भी नियमित रूप से चलेंगे।

हमारा प्रयास है कि महत्वपूर्ण स्तोत्रों का अधिकाधिक प्रसार हो।

संस्थापक संपादक – हेमन्त बावनकर/सम्पादक (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ ≈

Please share your Post !

Shares

सूचना/Information ☆ संपादकीय निवेदन ☆ प्रकाशन संबंधी महत्वपूर्ण सूचना 📖 ☆ सम्पादक मंडल ई-अभिव्यक्ति ☆

सूचना/Information 

(साहित्यिक एवं सांस्कृतिक समाचार)

📖 प्रकाशन संबंधी महत्वपूर्ण सूचना !! 📖

कुछ तकनीकी कारणों से आज गुरुवार  दि. ६/८ /२६ को ई-अभिव्यक्ति का प्रकाशन बंद रहेगा। 

आप सभी का इसी प्रकार स्नेह, प्रतिसाद और सहयोग अपेक्षित है।

 

– संपादक मंडल 

ई-अभिव्यक्ति 

संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ ≈

Please share your Post !

Shares