☆ मनाचे श्लोक – एक सार्वकालिक ‘मनोपनिषद’… – श्लोक ८७ आणि ८८ ☆ श्री विश्वास देशपांडे ☆
श्लोक क्र. ८७ – –
मुखी राम त्या काम बाधू शकेना ।
गुणे इष्ट धारिष्ट त्याचे चुकेना ।
हरिभक्त तो शक्त कामास मारी ।
जगी धन्य तो मारुती ब्रह्मचारी ।।८७।।
अर्थ : ज्या व्यक्तीच्या मुखी रामनाम आहे, त्याला कामवासना त्रास देऊ शकत नाही. नामाच्या शक्तीमुळे कामवासनेवर ताबा मिळवण्यासाठी लागणारे धैर्य त्याला आपोआप प्राप्त होते. नामामुळे सामर्थ्य प्राप्त झालेला भगवंताचा भक्त कामवासनेला सहज नष्ट करू शकतो. या गोष्टीचे मूर्तिमंत उदाहरण असलेला आणि ब्रह्मचर्याचे पालन करणारा मारुती जगामध्ये खरोखरच धन्य झाला आहे.
(काम – कामवासना, गुणे – त्या योगाने, शक्त – सामर्थ्य)
विवेचन :काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर हे माणसाचे मोठे शत्रू आहेत. ठरवले तर क्रोध, मद, मोह आदी विकारांवर नियंत्रण मिळवणे सोपे असते. परंतु काम हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू. त्यावर नियंत्रण प्राप्त करणे भल्याभल्यांनाही अवघड. विश्वामित्रांसारख्या तपस्वी ऋषींची तपश्चर्या मेनकेने भंग केली. पराक्रमी आणि विद्वान असलेला रावण आपल्या कामवासनेवर नियंत्रण मिळवू शकला नाही. त्यामुळे कामवासना जिंकणे अत्यंत अवघड. संसारी माणसाला कामवासनेचा मर्यादित उपभोग घेण्यास शास्त्रांची ना नाही. परंतु साधना करायची असेल तर संसारी व्यक्तीने देखील कामवासनेवर नियंत्रण ठेवणे क्रमप्राप्त असते. आपण ‘ काम ‘ आणि ‘ राम ‘ दोन्ही एकाच वेळी साध्य करू शकत नाही. ‘ राम ‘ हवा असेल तर ‘ काम ‘ सोडावा लागेल.
परंतु ज्याच्या मुखी रामनाम येते आहे, अशी व्यक्ती कामवासनेवर विजय मिळवू शकते. त्याला कामवासना बाधित करू शकत नाही. रामभक्त हनुमान हे याचे सर्वोत्तम उदाहरण आहे. त्याच्या हृदयात रामनामाचा अखंड जप सुरु आहे. त्यामुळे ‘ काम ‘ भावनेला तेथे थारा नाही. हनुमंत म्हणजे अखंड ब्रह्मचर्य पालन करणारा. मुखात रामनाम आणि ब्रह्मचर्य पालन यामुळे त्याच्या अंगी धैर्य, शक्ती यासारखे इष्ट गुण निर्माण झाले आहेत. त्याला ‘ काम ‘ विचलित करू शकत नाही. जेव्हा सीतेचा शोध घेण्यासाठी तो लंकेत गेला तेव्हा रावणाच्या अंतःपुरात अनेक सुंदर स्त्रिया नको त्या अवस्थेत त्याच्या नजरेस पडल्या. परंतु सदैव जो रामनामातच रंगला आहे, अशा महाबली हनुमंताला ते दृश्य विचलित करू शकले नाही. सीतेच्या समोरही तो आपल्या स्वतःचा तिचा पुत्र म्हणून उल्लेख करतो. म्हणूनच ब्रह्मचारी असलेला हनुमान जगात धन्य आहे.
म्हणून समर्थ म्हणतात, ” हरिभक्त तो शक्त कामास मारी ” जो कायम हरीची भक्ती करतो, असा सामर्थ्यशाली माणूस कामवासनेला मारून टाकण्यासाठी समर्थ असतो. अशा व्यक्तीचे नाम परा वाणीपर्यंत पोहोचलेले असते. परा वाणीचे केंद्र हे नाभीजवळ आहे असे म्हटले जाते. कामवासनेचे केंद्र देखील त्याच ठिकाणी आहे. एकदा का नाम नाभीपर्यंत परा वाणीच्या माध्यमातून पोहोचले की तेथे कामवासना राहूच शकत नाही. संत कबीर म्हणतात, ” जहाँ काम तहाँ राम कहाँ । जहाँ राम तहाँ काम कहाँ।”
स्वतः समर्थच या श्लोकाचे उत्तम उदाहरण आहेत. मुखी अखंड रामनाम आणि ब्रह्मचर्य पालन. त्यामुळे शक्ती, धैर्य हे गुण आपोआपच त्यांच्या ठायी वास करीत होते. त्यामुळे रामसेवेचे मोठे कार्य त्यांच्या हातून घडले. म्हणूनच तेही जगात धन्य आहेत.
स्वसंवाद ::
१. माझ्या दैनंदिन व्यवहारात माझे मन बाह्य आकर्षणे किंवा विकारांमुळे विचलित होते का? अशा वेळी मी हनुमंताप्रमाणे रामानामाचा आश्रय घेतो का?
२. “जिथे काम तिथे राम नाही, आणि जिथे राम तिथे काम नाही, ” हे कबीरांचे वचन लक्षात ठेवून मी माझ्या मनात प्रभू श्रीरामांना अढळ स्थान दिले आहे का?
३. माझ्या हातून होणारे नामस्मरण केवळ ओठांवर (वैखरी) आहे, की ते नाभीपर्यंत (परा वाणी) पोहोचून माझ्या विकारांचे शुद्धीकरण करत आहे?
४. समर्थांनी सांगितल्याप्रमाणे, स्वतःमध्ये ‘धैर्य आणि शक्ती’ हे उत्तम गुण निर्माण करण्यासाठी मी रोजच्या धावपळीत जाणीवपूर्वक भगवंताचे नाम घेतो का?
=====
श्लोक क्र. ८८ – –
बहू चांगले नाम या राघवाचे ।
अती साजिरे स्वल्प सोपे फुकाचे ।
करी मूळ निर्मूळ घेता भवाचे ।
जिवा मानवा हे चि कैवल्य साचे ।।८८।।
अर्थ :या रामाचे नाव अतिशय चांगले आहे. ते सुंदर, छोटेसे, म्हणायला सोपे आणि बिनखर्चाचे आहे. हे नाम भवाचे म्हणजे संसाराचे मूळ कारणच नाहीसे करते. हे नाम मोक्ष किंवा परमात्म्याचे दर्शन घडवणारे आहे.
(साजिरे – सुंदर /शोभून दिसणारे, स्वल्प – छोटेसे, फुकाचे – बिनखर्चाचे, मूळ – मूळ कारण, निर्मूळ – समूळ उच्चाटन करणे, कैवल्य – मोक्ष/चिरंतन सुख, साचे – नक्कीच/खरोखर)
विवेचन :या श्लोकात समर्थ नामाचे महत्व पुन्हा एकदा स्पष्ट करतात. ‘ राम ‘ हे नावच किती चांगले आहे! सुंदर आहे, अल्पं आहे. ते घेण्यास कोणताही खर्च करावा लागत नाही. बरं, हे नाव घ्यायचे तरी कशासाठी? तर समर्थ सांगतात की हे नाम ज्या संसारात येऊन माणूस सुखदुःखे भोगतो, जन्ममरणाच्या फेऱ्यात अडकतो, त्याचे मूळ कारणच नाहीसे करणारे आहे. हे मूळ कारण नाहीसे करते म्हणजे तरी काय करते? तर हे नाम कैवल्यप्राप्ती करून देणारे आहे. कैवल्य म्हणजे मोक्ष. मोक्ष म्हणजे चिरंतन सुख! तेच प्राप्त करून देणारे हे रामनाम.
एखादी छोटीशी परिणामकारक गोळी असावी आणि ती घेतल्याने आजार समूळ नाहीसा व्हावा तशी ही गुटिका आहे. दिसायला छोटी पण अत्यंत परिणामकारक. ज्याने ज्याने ती घेतली, त्याचा भवंताप नाहीसा झाला. पण खरे कारण असे की आमचा विश्वासच यावर बसत नाही. एक छोटेसे दोन अक्षरांचे नाम. त्याच्यात एवढे सामर्थ्य कसे असेल? पण त्याच्यातील सामर्थ्याचा प्रत्यय तेव्हाच येईल, जेव्हा ते मनापासून घेतले जाईल. वाल्या कोळ्याने रामनाम घेतले आणि अखिल विश्वाला वंदनीय अशा वाल्मिक ऋषींमध्ये त्याचे रूपांतर झाले. त्यांच्या हातून ‘ रामायण ‘ हा अजरामर ग्रंथ लिहिला गेला. रामाचे नाव काय करू शकत नाही. समुद्रात सेतू बांधणाऱ्या वानर सेनेने दगडावर फक्त ‘ राम ‘ असे लिहिले आणि काय आश्चर्य! ज्या दगडांचा मूळ गुणधर्म पाण्यात बुडण्याचा, ते चक्क पाण्यावर तरले. एवढेच नाही तर त्यावरून रामाची सेना लंकेला पोचली.
या भवसागरात आपल्यालाही तरून जायचे असेल तर हृदयामध्ये ‘ रामनामाला ‘ स्थान देणे जरूर आहे. अन्यथा पाषाणात आणि आपल्यात काही फरक राहणार नाही. बुडणे हे ठरलेले. रामनाम ही या भवसागरातून तारून नेणारी नौका आहे. बरं, हे नाम तरी किती सोपं, सुंदर आणि बिनखर्चाचे. बसल्या बसल्या, काम करताना तुम्ही केव्हाही ते घेऊ शकता. त्यातली गोडी ही अनुभवावी लागते. ती सांगून कळत नाही. अनुप जलोटा यांनी गायिलेले भजन ‘ जगमें सुंदर हैं दो नाम, चाहे कृष्ण कहो या राम.’ आपल्याला माहिती असेल. ‘ राम ‘ या दोन अक्षरी शब्दात ‘ र ‘ हे अक्षर अग्निवर्णाचे निदर्शक आहे तर ‘ म ‘ हे अक्षर चंद्राची शीतलता दाखवणारे आहे. थोडक्यात म्हणजे ‘राम ‘ या शब्दात सूर्यशक्ती आणि चंद्रबल यांचा मिलाफ आहे. ते संतुलित आहे. म्हणूनच ज्याने ते घेतले, त्याच्या आयुष्यात संतुलन साधले जाते. ‘ जय जय राम, जय श्रीराम, दो अक्षर का प्यारा नाम, रामनाम के जपनेसेही बन जाते सब बिगडे काम. ‘
रामनाम घेण्याची मनाला सवय लावली तरच आयुष्याच्या अखेरीस मुखात रामनाम येईल. हे घडले तर कैवल्यप्राप्ती आहेच. मन विषयविकारात अडकले तर अखेरीस ओठावर रामनाम न येता अन्य कशात तरी मन अडकेल आणि मग पुन्हा जन्ममृत्यूच्या फेऱ्यात आपण अडकू. रामनामाचा जप केल्याने साधक रामरूप होतो. तुकाराम महाराज म्हणतात, “राम म्हणता रामच होईजे, पदी बैसोनि पदवी घेईजे. “
स्वसंवाद ::
१. जे नाम अतिशय सुंदर, सोपे आणि ‘फुकाचे’ (बिनखर्चाचे) आहे, ते घेण्यासाठी मी आळस करतो की अत्यंत आदराने त्याचा स्वीकार करतो?
२. संसारातील सुखांमध्ये रमून मी केवळ ‘बुडणाऱ्या पाषाणासारखे’ आयुष्य जगत आहे, की रामनामाची नौका धरून या भवसागरातून ‘तरून’ जाण्याचा प्रयत्न करत आहे?
३. माझ्या आयुष्यात सुख-दुःखाचे प्रसंग येताना मानसिक संतुलन राखण्यासाठी, मी रामनामातील सूर्यशक्ती आणि चंद्रबलाचा अनुभव घेतो का?
४. तुकाराम महाराजांनी म्हटल्याप्रमाणे, “राम म्हणता रामच होईजे” या अवस्थेपर्यंत पोहोचण्यासाठी मी माझ्या मनाला नामस्मरणाची अखंड सवय लावत आहे का?
☆ मला समजलेली संत तुकारामांची अभंग गाथा… भाग – ३२ ☆ अरुणा मुल्हेरकर ☆
समर्पण (२)
पांडुरंगाची भक्ती करताना संत तुकाराम भगवंताच्या पायी लीन झाले आहेत, त्यांची देह बुद्धी नष्ट होऊन परमेश्वराशी त्यांनी स्वतःला कसे समर्पित केले आहे याविषयीचे काही अभंग मागील लेखात आपण पाहिले. आज आणखी काही अभंगांचा परामर्श घेऊ.
महाराजांना चोहीकडे एका परमेश्वराचेच रूप दिसत आहे, त्याचाच आवाज त्याला ऐकू येत आहे. ते देवाला म्हणतात…
ध्याईन तुझे रूप/ गाईन तुझे नाम/
आन न करी काम/ जिव्हा मुखे//
पाहिन तुझे पाय/ ठेवीन मी डोई/
पृथक ते काही/ न करी आन//
तुझेचि गुण नाद/ आईकेन कानी/
आणिकांची वाणी/ पुरे आता//
करीन मी सेवा करे/ चालेन मी पायी/
आणिक न वजे ठायी/ तुजविण//
तुका म्हणे जीव/ ठेवीन मी पायी/
आणिक ते काही/ देऊ कवणा//
हे देवा मी सदैव तुझेच रूप माझ्या डोळ्याने पाहत राहीन आणि तुझेच नाम सतत गात राहीन. माझ्या जिभेवर दुसरे काहीच येणार नाही. माझ्या डोळ्यांनी फक्त तुझे पाय मी पाहीन आणि त्यावरच माझे मस्तक ठेवीन.
त्याशिवाय दुसरे काही करणार नाही. तुझे गुणगान ऐकत राहीन, बाकी काही बडबड करणार नाही. तुझ्याकडे पायी चालत येईन आणि या माझ्या हाताने तुझी सेवा करीन. तुला सोडून दुसरीकडे कोठेही मी जाणार नाही. हा माझा जीव तुझ्या चरणी अर्पण करीन. आता दुसऱ्या कुणाला देण्यासाठी माझ्याकडे काही उरले नाही. हरीनामा- व्यतिरिक्त तुकारामांकडे काही नव्हते, ते हरिमय झाले होते.
एका विठू माऊलीला शरण गेल्याने भक्ताचा कसा फायदा होतो ते महाराज या अभंगात सांगत आहेत.
भावे ऐसा नाश/ अवघिया दिला त्रास/
अविटाचा केला संग / सर्व भोगी पांडुरंग//
आइताच पाक/ संयोगाचा सकळीका/
तुका म्हणे धणी / सीमा राहिली होऊनी//
आज पर्यंत मी दुसऱ्यांना जो काही त्रास दिला असेल आणि त्यामुळे मला जे पाप लागले असेल, ते या पांडुरंगाला शरण गेल्यामुळे आता नष्ट होईल. कारण त्याच्या अवीट भक्तीमुळे मला त्याचा संग लागला आहे आणि माझी सर्व सुखदुःखे तो एक पांडुरंग आता भोगत आहे. तुकाराम महाराजांना हेच सांगायचे आहे की हरिभक्तीत लीन झाल्यामुळे भक्ताला सुखदुःखाची जाणीव राहत नाही. कोणत्याही परिस्थितीत, चांगली अथवा वाईट त्याचा समभाव राहतो.
तुकाराम सांगतात की अन्नाचा दुष्काळ पडला आहे किंवा त्यांना फार भूक लागली आहे म्हणून ते अन्न सेवन करत नाहीत, तर सर्वसाक्षी जनार्दनाचा मान राखण्यासाठी ते भोजन करतात. बालका बरोबर जर ते जेवावयास बसले तर त्यांना असे जाणवते की आमचा पिताच आम्हाला मोठ्या प्रेमाने भरवीत आहे.
चांगली आणि वाईट दोन्ही कर्मे जेथे जळून जातात ते आत्मपद महाराजांना प्राप्त झाले आहे. मी कोणी नसून कर्ता- करविता तोच एक नियंता आहे याची अनुभूती त्यांना आलेली आहे.
तुकारामांच्या मनाची ही अवस्था ते या अभंगातून कशी व्यक्त करत आहेत ते बघा.
जे जे काही करितो देवा/ ते ते सेवा समर्पे//
भेद नाही सर्वात्मना/ नारायणा तुज मज //
आम्ही दुजे नेणो कोणा/ हेचि मना मन साक्ष/
तुका म्हणे जगन्नाथा/ हे अन्यथा नव्हे की//
ते जे जे काही कर्म करतात ते ते सर्व एका नारायणाला समर्पित करायचे या एका मनोभूमीकेतून. सर्वात्मक सर्वेश्वर आणि तुकाराम महाराज स्वतः यात तो आणि मी असा जराही भेद आता राहिलेला नाही. त्यांचे मनच या स्थितीला साक्षी आहे. ते पुन्हा पुन्हा सांगतात, ” हे जगन्नाथा, मी हे जे सांगतो आहे ते पूर्ण सत्य आहे, यात जराही खोटेपणा नाही.”
लोहचुंबकाच्या बळे/ उभे राहिले निराळे/
तैसा तूचि आम्हा ठाई/ खेळतासी अंतर्बाही //
भक्ष अग्नीचा तो दोरा/ त्यासी वाचवी मोहरा/
तुका म्हणे अधीलपणे/ नेली लाकडे चंदने//
नारायणाच्या संगतीने भक्त कसा परमेश्वराशी एकरूप होतो हे तुकाराम महाराजांनी वरील अभंगात काही उदाहरणे देऊन स्पष्ट केले आहे.
चुंबकाच्या आकर्षणाने लोखंडाची सुई उभी राहते, तसा परमेश्वर भक्तांच्या अंतर्बाह्य उभा आहे. धाग्याचा धर्म आगीने जळण्याचा असतो, परंतु तोच धागा मोहरा नामक खड्याला गुंडाळून अग्नीत टाकला तर जळत नाही. चंदनाच्या संगतीने इतर वृक्षांचे गुणधर्म जाऊन त्यांना चंदनाचा सुगंधी गुण येतो. सत्संग किती महत्त्वाचा आहे ही गोष्ट या उदाहरणांवरून आपल्या लक्षात येते. तात्पर्य, देवाच्या संगतीने भक्त आमुलाग्र बदलतो.
समर्पणाविषयी अनेक अभंग आपल्याला गाथेत आढळतात. मला असे वाटते की या सर्व अभंगांचा आपण अभ्यास करावा. चांगल्या वाचनाने आपल्यावरही चांगले संस्कार होऊन उचित परिणाम होऊ शकतो. यास्तव पुढील लेखात समर्पणाविषयीचे आणखी काही अभंग आपण अवश्य विवेचनासाठी घेऊ.
जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच या संस्थेने आयोजित केलेल्या काव्य स्पर्धेत आपल्या समुहातील ज्येष्ठ साहित्यिका सौ. ज्योत्स्ना तानवडे यांच्या काव्यास उत्तेजनार्थ पुरस्कार प्राप्त झाला आहे.
ई अभिव्यक्ती परिवारातर्फे सौ. तानवडे यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा 💐
आज पुरस्कार प्राप्त काव्य प्रकाशित करत आहोत.
संपादक मंडळ
ई अभिव्यक्ती मराठी
☆ ☆ ☆ ☆ ☆
कवितेचा उत्सव
☆ “सांग दर्पणा” ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे ☆
(जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच आयोजित काव्य स्पर्धा ‘उत्तेजनार्थ सन्मान प्राप्त’)
☆ श्री रविंद्रनाथ टागोर यांची “गीतांजली”… भाग – ३५ ☆ मराठी भावानुवाद – डॉ. शोभना आगाशे ☆
श्री रविंद्रनाथ टागोर
रवींद्रनाथ टागोरांच्या इंग्रजी गीतांजली मधील १०३ कवितांचा भावानुवाद आम्ही बहिणींनी, मंजिरी येडूरकर व शोभना आगाशे, मिळून केला. हे कोविड काळातील अपत्य!
घरातल्या सगळ्यांनी त्या कवितांचं खूप कौतुक केलं आणि यांचं पुस्तक छापायचं हे ठरवून टाकलं. शेवटी ‘गीतांजली जशी भावली तशी’ हे पुस्तक प्रकाशित झालं, वर्षभरात चार संस्थांनी त्याचा गौरवही केला. हे सगळं आमच्या आयुष्यात पहिल्यांदाच व अनपेक्षीत घडल्यामुळं भारी वाटत होतं.
पण खरं भारी वाटलं ते कवितांचा अनुवाद करतांना! मूळ इंग्रजी कविता, गद्य स्वरूपाच्या आहेत. जुन्या स्टाईलचं अवघड इंग्रजी आहे. आम्ही सुरवातीलाच ठरवलं होतं की आपण दुसऱ्या कुणाचाही अनुवाद आधी वाचायचा नाही; कारण कोणताही पूर्वग्रह घेऊन केलेला अनुवाद ‘आपला’ वाटणार नाही. मग त्यातल्या बऱ्या वाईटाची जबाबदारी आपण कशी घेणार! आपल्या कविता शक्यतो गेय होतील, असा प्रयत्न करायचा. मन अगदी स्वच्छ ठेऊन, आपल्याला काय वाटतंय ते लिहायचं. अर्थात याचं पुढे जाऊन पुस्तक होईल हे ध्यानी मनी सुद्धा नव्हतं. जवळजवळ महिनाभर आम्ही चर्चा करून प्रत्येक कवितेचा कीस पाडलाय.
एक मुख्य अडचण वाटली, ती म्हणजे, या कविता आध्यात्मिक विषयावर आहेत, असं वाचलं होतं. पण आमच्या लक्षात आलं की, अगदी अध्यात्मिक नाही पण प्रत्येक कविता एक विचार व्यक्त करते. मात्र तो विचार व्यक्त करण्यासाठी रविंद्रनाथ जी रूपकं वापरतात, ती समजायला जरा अवघड, त्यातून इंग्रजीमध्ये, त्यामुळे काही काही कवितांवरील चर्चा दिवस दिवस चालायची. पण शेवटी एकतर एकमत व्हायचं किंवा दोघींपैकी एकीवर पूर्ण जबाबदारी टाकली जायची.
त्यांच्या बऱ्याच कविता गोष्टीसारख्या आहेत. ३१ व्या कवितेत कवीला खूप श्रीमंत व्हायचं असतं. जगावर सत्ता मिळवायची, म्हणजे अनभिषिक्त सम्राट व्हायचं असतं. त्यासाठी तो सगळ्या जगाला कैदी बनवणार असतो. त्यासाठी तो रात्रभर बसून जड साखळदंड बनवतो. सकाळी उठून पाहतो तर त्या साखळदंडांनी तो स्वतःच जखडला गेलेला असतो. यातून आपण सुविचार सांगू शकतो, दुसऱ्याचं वाईट चिंतून किंवा मोहात लिप्त राहून आपलं भलं होत नाही.
६४ व्या कवितेत नदीच्या उतरणीवरून संध्याकाळी एक स्त्री दिवा घेऊन निघालेली असते. कवी तिला तो दिवा आपल्याला देण्याची विनंती करतो कारण त्याच्या घरात अंधार असतो. ती म्हणते हा नदीच्या प्रवाहात सोडण्यासाठी नेते आहे. पुन्हा ती अशीच दिवा घेऊन येते. पुन्हा कवी तिला दिवा मागतो. ती म्हणते नभाला अर्पण करणार आहे. पुन्हा रात्री येते. ती म्हणते दिव्यांची आरास करायची आहे. कवीला सर्व दिवे तिनं व्यर्थ घालवले असं वाटतं. वर वर पाहता यात दडलेला अर्थ लक्षात येत नाही पण विचार केल्यावर समजतं की कवीला इथे सांगायचं आहे की, आपल्या अज्ञानाचा अंधार दुसऱ्यांच्या आयत्या दिव्यांनी नष्ट होत नाही. त्यासाठी आपणच प्रयत्नपूर्वक ज्ञानाचा दीप चेतवून हा अंधार दूर करावा लागतो. किंवा जे ज्ञानी लोक असतात ते पूर्ण आसमंत उजळून टाकण्याची इच्छा बाळगतात.
आणखी एक उदाहरण द्यावं असं वाटतंय. ५८ व्या कवितेत आनंद कुठं कुठं राहतो याचं वर्णन आहे. त्यातील एक वाक्य असं आहे, the ‘joy that sits still with its tears on the open red Lotus of pain’ याचा अर्थ काय असेल याचा विचार करताना मनात आलं उमलताना कमळाला त्रास होत असेल का, त्याच्या अश्रूच्या थेंबात आनंद राहत असेल का? की तो थेंब ओघळू नये, अश्रू आहेत हे कळू नये म्हणून राहतो, का त्या चमकणाऱ्या थेंबाकडे पाहताना आपण खूप आनंद मिळवावा म्हणून तिथे आनंद राहतो. किंवा आणखी काय काय चर्चा करत होतो, शेवटी लक्षात आलं की कवीला म्हणायचं आहे की सुखदुःख, हसू-आसू हे एकत्रच असतात, एका पाठोपाठच येतात.
ह्या निर्मितीच्या काळात होणाऱ्या आमच्या बौद्धिक चर्चा, त्यासाठी केलं जाणारं वाचन सगळं फार भारी वाटायचं. कारण शिक्षकी पेशातून निवृत्त झाल्यापासून बुद्धीला खाद्य मिळणे बंद झालं होतं. एकूण सगळं खूप कष्टाचं, पण खूप आनंददायी होतं.
त्यानंतर सांगलीतल्या साहित्यिक मैत्रिणींच्यामुळे ई अभिव्यक्तीची माहिती कळली. सुश्री उज्ज्वला केळकर, श्री सुहास पंडित, सुश्री मंजुषा मुळे व अन्य सर्व सुहृदांच्या प्रोत्साहनामुळे इतरही काहीबाही लिहायला लागलो व साहित्य, साहित्यिक यांच्या संगतीमुळं आमचा बौद्धिक विकास होऊ लागला.
१० डिसेंबर २०२५ पासून आमच्या गीतांजलीतील कविता, मूळ इंग्रजी कवितांसह ई अभिव्यक्तीवर प्रकाशित व्हायला सुरवात झाली. आजच्या या ३५ व्या भागाबरोबर ही मालिका संपन्न होत आहे. आम्हाला ही संधी दिल्याबद्दल ई-अभिव्यक्ती साहित्य-मंचाच्या संपादक मंडळाचे मनापासून आभार.
– शोभना आगाशे
– मंजिरी येडूरकर
—–
☆ गीत : १०२ ☆
I BOASTED among men that I had known you. They see your pictures in all works of mine. They come and ask me, “Who is he? ” I know not how to answer them. I say, “Indeed, I cannot tell. ” They blame me and they go away in scorn. And you sit there smiling.
I put my tales of you into lasting songs. The secret gushes out from my heart. They come and ask me, “Tell me all your meanings. ” I know not how to answer them. I say, “Ah, who knows what they mean! ” They smile and go away in utter scorn. And you sit there smiling.
IN one salutation to thee, my God, let all my senses spread out and touch this world at thy feet.
Like a rain-cloud of July hung low with its burden of unshed showers let all my mind bend down at thy door in one salutation to thee.
Let all my songs gather together their diverse strains into a single current and flow to a
sea of silence in one salutation to thee.
Like a flock of homesick cranes flying night and day back to their mountain nests let all my life take its voyage to its eternal home in one salutation to thee.