मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ घर कौलारू… ☆ प्राची अभय जोशी ☆

प्राची अभय जोशी

? कवितेचा उत्सव ?

☆ घर कौलारू… ☆ प्राची अभय जोशी ☆

मन एक विचारांचं आकाश

निळ्या निळ्याभोर स्वच्छ

आकाशाची सोनेरी पहाट

मन प्रकाशाचा कवडसा

धरतीवर चमचमणारा

आशेच्या किरणांनी

दाही दिशा उजळवणारा

मन एक पवित्र देव्हारा,

भगवंताच्या नित्य वासाचा

तरीही वाटे हा एक आभास

मनन चिंतन हा एक ध्यास

मन वेदना, मन संवेदना

सुख दुःखाच्या वेगळ्या कल्पना

रंगात भिजलेल्या भावना

भावनांच्या रंगांचे सुंदर साजिरे

मखमली फुलपाखरू

मन म्हणजे प्रत्येकाच्या,

भाव संवेदनांचं घर कौलारू

 

 घर कौलारू…

©  प्राची अभय जोशी

मो 9822065666 

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
1

मराठी साहित्य – काव्यानंद ☆ कळी फूल होताच… – राधा गर्दे ☆ रसग्रहण… सुश्री अरुणा मुल्हेरकर ☆

अरुणा मुल्हेरकर

? काव्यानंद ?

☆ कळी फूल होताच… – राधा गर्दे ☆ रसग्रहण… अरुणा मुल्हेरकर ☆

☆ कळी फूल होताच… – राधा गर्दे ☆

(भावगीत)

कळी फूल होताच धुंदावली

वसंतासवे गर्विता जाहली॥ध्रु॥

*

सुगंधात न्हाऊन सुस्नात ही

दवाची गळा माळ घालोन ही

कशी ऐट दावीत गंधाळली

वसंतासवे, गर्विता जाहली ॥१॥

*

अली चुंबिता रोखुनी पाहते

तरी मुग्ध होऊनिया लाजते

मनाने अलिशी असे बांधली

वसंतासवे गर्विता जाहली ॥२॥

*

मिटे पाकळ्यांना हळू रुपसी

खुले रूप लावण्य हे राजसी

जणू मेनकारूप ही ल्यायली

वसंतासवे गर्विता जाहली॥३॥

*

पहाटेस निहार सुस्तावता

चकाकून देहावरी थांबता

शहारुन ती बावरू लागली

वसंतासवे, गर्विता जाहली ॥४॥

कवयित्री सौ. राधा गर्दे यांचे हे भावगीत वाचले आणि ताबडतोब त्यांच्या परवानगीने मी रसग्रहण लिहायला बसले.

सौ. राधा गर्दे या संस्कृत पंडिता आहेत. त्यांच्या काव्यातून अनेकदा संस्कृत शब्दांचा मुक्त संचार आढळतो. खरं सांगायचं तर संस्कृत ही मराठी भाषेची जननी आहे, आणि जेव्हा आपण भारदस्त भाषा वापरतो तेव्हा या संस्कृत शब्दांच्या पखरणीमुळे भाषेचे सौंदर्य वाढते. राधाताईंच्या या कवितेतून नेमके हेच चित्र दृश्यरूप झाल्याचे आढळते.

 कळी फुल होताच धुंदावली

 वसंतासवे गर्विता जाहली॥ध्रु॥

ध्रुवपदाच्या या दोन ओळी वाचता क्षणीच आपल्या नजरेसमोर चित्र येते ते वसंत ऋतुतल्या बहराचे. जिकडे तिकडे जाई, जुई, मोगरा, चमेली, सोनचाफा ही सुगंधित फुले फुललेली असतात आणि वातावरणात एक प्रकारची प्रसन्नता दिसून येते. या फुलातील एका कळीला तिच्या सौंदर्याचा गर्व होतो अशी कवयित्रीची कल्पना आहे.

 सुगंधात न्हाऊन सुस्नात ही

 दवाची गळा माळ घालोन ही

कशी ऐट दावीत गंधाळली

वसंतासवे…

हे कळीचे नुकतेच उमलून आलेले फुल त्याच्यावरील दवबिंदूंच्या वर्षावाने जणू काही न्हाऊन निघाले आहे आणि मोठ्या रुबाबात ते त्याचा परिमळ सर्वत्र पसरवत आहे.

 अली चुंबिता रोखुनी पाहते

 तरी मुग्ध होऊनिया लाजते

 मनाने अलीशी असे बांधली

 वसंतासवे…

या दुसऱ्या अंतर्‍यात त्या फुलावर लुब्ध होऊन

अली म्हणजे भ्रमर त्याचे चुंबन घेत आहे आणि ते फुल अतिशय मुग्ध व लज्जीत झाले आहे. त्या फुलाच्या मनात या मधुपा विषयी गोड प्रेम भाव निर्माण झाला आहे.

 मिटे पाकळ्यांना हळू रुपसी

 खुले रूप लावण्य हे राजसी

 जणू मेनका रूप ही ल्यायली

 वसंतासवे…

राधाताई या तिसऱ्या कडव्यात काय सांगत आहेत? तर लाजेने ते फुल आपल्या पाकळ्या अलगदपणे मिटून घेत आहे आणि त्यामुळे त्याचे राजस रूप अधिकच खुलले आहे.

 पहाटेस निहार सुस्तावता

 चकाकून देहावरी थांबता

 शहारुन ती बावरू लागली

 वसंतासवे, गर्विता जाहली.

या शेवटच्या अंतऱ्यात त्या फुलाची अवस्था राधाताईंनी फार सुंदर शब्दात वर्णन केली आहे. पहाटेच्या वेळी जशी काही दाट धु क्याची शाल फुलाच्या सर्वांगावर घातली आहे, पहाटेच्या गारव्यामुळे ते फुल जसे काही शहारून गेले आहे.

हा झाला या कवितेचा शब्दशः अर्थ. पण जसजशी ही कविता वाचत जावी तसतसे लक्षात येते की हे एका कळीचे फुलात झालेल्या रूपांतराचे नुसते प्रासादिक वर्णन नसून ही संपूर्ण कविता म्हणजे एक रूपक आहे.

एका मुग्ध बालिकेने नुकतेच तारुण्यात पदार्पण केले आहे. वसंत ऋतु म्हणजे त्या वयात आलेल्या मुलीच्या मनातील मधुर सुगंधित असे भाव आहेत. तिच्या सौंदर्याचा तिला थोडा गर्व झाला आहे, त्याची ऐट दाखवत ती रुबाबात वावरते आहे. तिचे चुंबन घेणारा भ्रमर हा दुसरा तिसरा कोणी नसून तिचा सखा आहे. त्याच्यासोबत ती मनाने जोडली गेली आहे. त्याच्या स्पर्शाने तिचे रोमरोम शहाले आहे आणि स्त्री सुलभलज्जेने तिचे सौंदर्य इतके खुलले आहे की जणू काही स्वर्गातली अप्सरा मेनकाच पृथ्वीतलावर अवतरली आहे. पहाटेचे धुके म्हणजे प्रियकराच्या सहवासातील प्रेम आहे. त्या प्रेमाच्या धुंदीत तिचे मन बावरून गेले आहे.

चेतनगुणोक्ती अलंकाराने सजलेली राधाताईंची ही कविता प्रत्येक वाचकाच्या मनाचा ठाव घेणारे एक सुंदर भावगीत आहे.

भुजंगीवृत्तात ही कविता राधाताईंनी अगदी सहज लिहिल्यासारखी वाटते. अली, निहार, राजसी इत्यादी शब्द कवितेत कसे अगदी चपखल बसले आहेत. रूपसी राजसी, सुस्तावता थांबता वगैरे स्वरयमकेही सहज वाटतात. कुठेही कसलीही ओढाताण नाही. वृत्तबद्ध कविता लिहिणे ही गोष्ट तशी सहज करता येण्यासारखी नाही, कारण कवीला सुचलेला शब्द वृत्ताच्या लगावलीत किंवा मात्रेत बसतोच असे नाही. अशावेळी कवीच्या प्रतिभेचा कस लागतो. राधाताई शब्दांच्या या झटापटीतून अगदी अलगद बाहेर पडल्याचे दिसून येते.

अशाच लिहित्या रहा. पुढील वाटचालीसाठी आपल्याला खूप खूप शुभेच्छा!

© अरुणा मुल्हेरकर 

डेट्राॅईट (मिशिगन) यू.एस्.ए.

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ || बाप, नवरा अन् मुलगा || ☆ कावेरी सुतार ☆

कावेरी सुतार

? कवितेचा उत्सव ?

|| बाप, नवरा अन् मुलगा || ☆ कावेरी  सुतार ☆

लहानपणीच त्याच्या हातांत, घराचं ओझं दिलं जातं,

मुलगा आहेस तू, रडायचं नाही, हे मनावर बिंबवलं जातं.

.

शिक्षण सुटतं, स्वप्नं तुटतात, ओढ लागते तीकामाची,

तरीही जगाला किंमत नसते, त्याच्या घामाची अन् श्रमाची.

.

नोकरी नसेल तर स्वतःच्याघरात, तो उपरा होऊन जगतो,

प्रत्येकाच्या नजरेतली टोचणी, तो निमूटपणे बघतो.

.

लग्नानंतर तर फक्त सुखाचे, मुखवटे त्याला लेवावे लागतात,

स्वतःची फाटकी झोळी लपवून, दुसऱ्यांचे हट्ट पुरवावे लागतात.

.

तिला वाटतं तो कठोर आहे, त्याला काहीच वाटत नाही,

पण त्याच्या काळजाचा हुंदका, कधीच शब्दांत फुटत नाही.

.

मुलांची फी, कधी बायकोचाअबोला,

या सगळ्यांच्या ओझ्याखाली, झालाय अधांतरी झोला.

.

तो जुनेच कपडे घालतो, जेणेकरून घर नीट दिसावं,

तो अर्धपोटी झोपतो, जेणेकरून मुलांनी सुखात हसावं.

.

तिला दिसतात फक्त त्याचे, रागीट अन् ताठर डोळे,

पण त्यालाच माहीत आहे, त्याने किती अश्रू आतच गिळले.

.

दिवसभर दुनियेच्या लाथा खाऊन, जेव्हा घरी परततो,

तेव्हाही तक्रारींचा पाऊस, त्याच्याच उंबरठ्यावर असतो.

.

पुरुष आहे म्हणून त्याचं, माणूसपणच हरवून जातं,

आणि अखेरच्या श्वासापर्यंत, तो फक्त एक जबाबदारीम्हणून उरतो.

अखेरच्या श्वासापर्यंत, तो फक्त एक जबाबदारीम्हणून उरतो…

© कावेरी सुतार

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ मनाचे श्लोक – एक सार्वकालिक ‘मनोपनिषद’… – श्लोक श्लोक ६१ आणि ६२ ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्री विश्वास देशपांडे

? इंद्रधनुष्य ?

☆ मनाचे श्लोक – एक सार्वकालिक ‘मनोपनिषद’… – श्लोक ६१ आणि ६२ ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्लोक क्र. ६१ – – – 

उभा कल्प वृक्षातळी दुःख वाहे |

तया अंतरी सर्वदा ते चि आहे |

जनी सज्जनी वाद हा वाढवावा |

पुढे मागुता शोक जीवी धरावा |६१|

अर्थ : एखादा माणूस कल्पवृक्षाच्या खाली उभा आहे परंतु त्याच्या मनात जर दुःखाची किंवा दुःख देणाऱ्या इच्छांचीच कामना असेल तर त्याला आयुष्यभर दुःखच भोगावे लागेल. त्याचप्रमाणे एखादी व्यक्ती संतांकडे गेली आणि त्यांच्याशी निरर्थक वाद घालू लागली तर त्यालाही आयुष्यभर दुःखालाच सामोरे जावे लागेल.

(वाहे- सुरू राहील, सज्जन- साधू पुरुष, वाद- निरर्थक चर्चा)

विवेचन : आधीच्या श्लोकात श्रीराम किंवा भगवंत म्हणजे कल्पतरू आहे असे समर्थांनी सांगितले. परंतु असा कल्पतरू किंवा कल्पवृक्ष आपल्याजवळ असताना त्याच्या छायेत उभे राहून दुःखाची किंवा दुःख देणाऱ्या गोष्टींची कामना करीत राहिलो तर आपल्या वाट्याला दुःख येईल आणि आयुष्यभर ते दुःखच सुरू राहील. काही माणसांचा स्वभावाच असा असतो की ते आपल्या विचारांनी स्वतःलाच दुःखी करून घेतात. चेहऱ्यावर कायमच बारा वाजलेले असतात. माझ्याच वाट्याला हे दुःख का? मी फार कमनशिबी आहे. मला कुठलीही गोष्ट सहजपणे मिळत नाही. अशा प्रकारचे निराशेचे विचार त्यांच्या मनामध्ये कायम घोळत असतात. आणि परिणामी दुःखच त्यांच्या वाट्याला येते. अशा लोकांबद्दल बोलताना समर्थ म्हणतात की असे लोक कल्पवृक्षाच्या खाली बसूनही दुःखच करीत राहतात त्यांच्या इतके अभागी कोणीच नाही.

खरे संत किंवा साधू पुरुष मुळातच भेटणे दुर्मिळ असते. ते आपल्यासाठी मोक्षमार्गाचे दिशादर्शक असतात. त्या मार्गावर कशी वाटचाल करावी याचे मार्गदर्शन ते करतात. त्यांच्या मनात सदैव आपल्या कल्याणाचीच इच्छा असते. म्हणूनच संतांबद्दल बोलताना तुकाराम महाराजांनी, ” संतांचिया गावी प्रेमाचा सुकाळू” असे म्हटलेआहे. पण काही व्यक्ती संतांजवळ आपले कल्याण करून घेण्याच्या हेतूने जात नाहीत. त्यांना नको ते प्रश्न विचारून किंवा त्यांच्याशी निरर्थक वाद घालून आपली विद्वत्ता ते दाखवण्याचा प्रयत्न करीत असतात. खरंच देव आहे का? तुम्ही पाहिला आहे का? देव आहे हे कशावरून? हे सगळे परमेश्वराच्याच मर्जीने घडते याचा काय पुरावा आहे? यासारखे निरर्थक प्रश्न असे लोक विचारत राहतात आणि निरर्थक व्यर्थ वाद घालत राहतात.

परमेश्वराच्या भक्तीचे महत्व, परमेश्वराची भक्ती कशी करावी, अनुसंधान कसे टिकवून ठेवावे या सर्व गोष्टी त्यांच्याकडून समजून घेण्याऐवजी त्यांच्याशी जर आपण अशा निरर्थक गोष्टींवर वाद घालत राहिलो तर आपल्या वाट्याला आयुष्यभर दुःखच येणार हे निश्चित! आणि वेळ निघून गेल्यानंतर आपली चूक कळली तरी काही उपयोग नसतो.

परमेश्वर सर्वव्यापी आहे. या अर्थाने आपण २४ तास कल्पवृक्षाच्या खाली उभे असतो. कल्पवृक्ष म्हणजे मागितलेले सगळे काही देणारा. या कल्पवृक्षाच्या खाली उभे राहून आपण ज्या काही इच्छा व्यक्त करू, त्यांना ‘तथास्तु’ म्हणून तो आशीर्वाद देत असतो. म्हणून नेहमी विधायक बोलणे, चांगल्या इच्छा ठेवणे आणि चांगले गोष्टींची कामना करणे हे आपल्या मनामध्ये असले पाहिजे. म्हणजे या चांगल्या गोष्टींसाठी त्या कल्पवृक्षाचा आशीर्वाद लाभेल. तो तथास्तु म्हणेल आणि त्या गोष्टी आपल्याकडे परत येतील. परंतु आपण जर दुःख देणाऱ्या गोष्टींची किंवा वाईट गोष्टींची अपेक्षा ठेवली तर त्याच गोष्टी आपल्याकडे परत येणार आहेत हे आपण लक्षात ठेवले पाहिजे. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर यालाच आपण लॉ ऑफ अट्रॅक्शन असे म्हणतो.

या ठिकाणी आपला असाही गैरसमज होण्याची शक्यता आहे की वाईट इच्छा आपण कशाला व्यक्त करू? परंतु आपण कामना करतो ते दुःख देणार्‍या गोष्टींचीच. भौतिक सुखे, ऐहिक गोष्टी आपल्याला हव्या असतात. पण त्या अंतिमतः दुःखच देतात. श्रेयस मागण्याऐवजी आपण प्रेयसाचीच कामना करतो. म्हणून आपल्या विचाराने आपणच आपले भविष्य घडवत असतो. आपणच आपल्या भविष्याचे शिल्पकार असतो.

समजा प्रत्यक्ष परमेश्वर भेटला किंवा अचानक कल्पवृक्षाच्या खाली बसण्याचे भाग्य लागले तर अशावेळी काय मागावे हे सुद्धा आपल्याला कळले पाहिजे. एका भिकारी माणसाने एक लॉटरीचे तिकीट विकत घेतले आणि अशी इच्छा करत बसला की मला जर ही लॉटरी लागली तर मी खूप श्रीमंत होईल आणि गाडीत बसून भीक मागेन. तेव्हा काय मागायचे किंवा इच्छा सुद्धा काय करायची याचेही ज्ञान हवे. त्यासाठी साधनेची आवश्यकता असते. मनामध्ये लोककल्याणाची भावना हवी. साधुसंत भेटल्यानंतर त्यांच्याकडून आत्मोद्धार कसा करून घेता येईल याबद्दल विचार करता यायला हवा. आणि या सगळ्या गोष्टींसाठी आपल्या इंद्रियांना वळण लावायला हवे. त्यासाठी वैराग्य आणि विवेक या दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत. अन्यथा नंतर केवळ पश्चातापच हाती उरतो.

म्हणूनच समर्थ या श्लोकातून आपल्याला बजावतात की कल्पवृक्षाची सावली सदैव आपल्यावर आहे, परंतु त्या सावलीचा लाभ घेण्यासाठी आपले मन शुद्ध, विवेकी आणि श्रेयसाभिमुख असणे अत्यावश्यक आहे. संतांची संगती हे त्याचेच साधन. आणि ते साधन वाया घालवणे म्हणजे स्वतःच स्वतःला दुःखाच्या गर्तेत लोटणे होय.

स्वसंवाद :: 

१. माझ्या आयुष्यात कल्पवृक्ष म्हणजे परमेश्वर सदैव सोबत आहे, हे मला खरोखर मनापासून वाटते का?

२. मी रोज जे विचार करतो, जे शब्द उच्चारतो, ते विधायक असतात की निराशेचे? माझ्या मनाचा कल कोणत्या दिशेने जास्त आहे?

३. एखाद्या संत, ज्येष्ठ व्यक्ती किंवा गुरूंशी बोलताना मी खरोखर काही शिकण्यासाठी जातो की माझी विद्वत्ता दाखवण्यासाठी?

४. “श्रेयस” आणि “प्रेयस” यांतला फरक मला कळतो पण मी प्रत्यक्ष आयुष्यात श्रेयसाची निवड किती वेळा करतो?

५. माझ्या जीवनातील एखाद्या दुःखाचे मूळ माझ्याच विचारांत किंवा चुकीच्या इच्छांमध्ये होते असे आता वाटते का? (क्रमशः)

– – – – 

श्लोक क्र. ६२ – – – 

निजध्यास तो सर्व तूटोनि गेला |

बळे अंतरे शोक संताप ठेला |

सुखानंद आनंद भेदे बुडाला |

मनी निश्चयो सर्व खेदे बुडाला |६२|

अर्थ :  भगवंताच्या भक्तीचा किंवा स्वस्वरूपाचा ध्यास एकदा तुटला की मनामध्ये शोक, संताप बळजबरीने ठाण मांडतात. सुख आणि आनंद नष्ट होतो आणि परमेश्वराच्या प्राप्तीचा मनामध्ये केलेला निश्चय देखील नष्ट होतो.

(निजध्यास – स्व स्वरूपाचे अनुसंधान, तूटोनी गेला – खंड पडला)

विवेचन : परमेश्वराची प्राप्ती करून घ्यायची असेल तर त्यामध्ये सातत्य आवश्यक असते. त्याचा ध्यास किंवा वेड मनाला लागणे आवश्यक असते. सततचे अनुसंधान किंवा स्व स्वरूपाचे चिंतन परमेश्वर प्राप्तीसाठी आवश्यक असते. परंतु आपले मन जेव्हा वादात अडकते तेव्हा हे अनुसंधान तुटते. मनामध्ये निरनिराळ्या प्रकारच्या शंका येऊ लागतात. मनाला काहीतरी काम देणे आवश्यक असते. रिकामे मन म्हणजे सैतानाचे घर असे आपण म्हणतो. जेव्हा परमेश्वराचे अनुसंधान तुटते तेव्हा या रिकाम्या मनामध्ये नको ते विचार गर्दी करू लागतात.

मनाचा मूळ स्वभाव शांततेचा आहे. जेव्हा सातत्याने परमेश्वराचे अनुसंधान, नामस्मरण, भजन, कीर्तन या गोष्टी सुरू असतात, तेव्हा मनामध्ये शांतता, सुख, समाधान आणि आनंद या गोष्टी नांदत असतात. परंतु ही शांतता, समाधान आणि आनंद मग भंग पावतात. शोक आणि संताप बळजबरीने मनाचा ताबा घेतात आणि मग आपण स्वतःला दुःखी करून घेत असतो.

अशी अवस्था जेव्हा आपल्या मनाची द्विधा स्थिती असते तेव्हा होते. संतांनी सांगितलेला उपदेश ऐकल्यानंतर किंवा कीर्तन, प्रवचन ऐकल्यानंतर आपण परमेश्वराची उपासना करावी अशी तीव्रतेने इच्छा होते. परंतु काही काळ गेल्यानंतर संतांच्या उपदेशाचा प्रभाव ओसरतो. परमेश्वरावर असलेली श्रद्धा डळमळीत होऊ लागते मग असे वाटते की परमेश्वर भेटेल की नाही माहिती नाही परंतु आज जो आनंद आपल्या हातात आहे तो उपभोगावा. जो निजध्यास घेतलेला असतो तो आपण सोडतो. तेवढे धैर्य किंवा तेवढी वाट पाहण्याची तयारी आपली राहत नाही. परिणामी चित्तात शोक आणि संताप घर करतात.

श्रद्धावान लभते ज्ञानम! श्रद्धावंतालाच ज्ञान प्राप्त होते. अर्थात हे ज्ञान म्हणजे परमेश्वर प्राप्तीचे ज्ञान किंवा स्व स्वरूपाचे ज्ञान. परंतु त्यासाठी संयम, विवेक आणि वैराग्य या गुणांची आवश्यकता असते. सामान्य माणसाजवळ एवढा धीर नसतो. म्हणून त्याने जी काही दोन चार पावले परमेश्वर प्राप्तीच्या मार्गावर टाकलेली असतात, तिथून तो मागे येतो. सद्गुरूंनी मला अमुक इतका जप करायला सांगितला होता. तेवढ्या संख्येमध्ये मी तो केला परंतु मला कोणताही अनुभव आला नाही किंवा परमेश्वराची प्राप्ती झाली नाही. असा विचार करून सामान्य माणूस अध्यात्ममार्गापासून ढळतो. पण ज्याची श्रद्धा अविचल असते, तो कितीही संकटे आली किंवा कितीही तपश्चर्या करावी लागली तरी त्यापासून ढळत नाही. जर त्याला कोणी सांगितले की तू एवढा जप केलास परंतु तेवढा पुरेसा नाही. तुला आणखी इतकाच जप करावा लागेल किंवा आणखी अमुक इतकी वर्षे तपश्चर्या करावी लागेल तर तो त्यासाठी आनंदाने तयार होतो. कारण त्याला माहिती असते की त्यानंतर परमेश्वर आपल्याला निश्चितपणे भेटेल. आणि अशा रीतीने ज्यांची श्रद्धा अविचल असते अशा लोकांना परमेश्वराची प्राप्ती झाल्याशिवाय राहत नाही.

म्हणून आपण संतसंगतीचा लाभ घ्यावा. त्यांच्याकडून परमेश्वर प्राप्तीचे रहस्य जाणून घेण्याचा प्रयत्न करावा. आणि त्यांच्याशी निरर्थक वाद न घालता त्यांच्या सांगण्याप्रमाणे वाटचाल करावी. वेळीच सावध होणे गरजेचे आहे हेच समर्थ या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितात. तेव्हा निजध्यास सोडू नका. संत सोहिरोबा म्हणतात, ” हरी भजनावीण काळ घालवू नको रे. “

स्वसंवाद :: 

१. निजध्यास केव्हा आणि का तुटतो?

२. कीर्तन-प्रवचनानंतर वाटणारी तीव्र भक्तिभावना काही दिवसांत का ओसरते? यावर उपाय काय?

३. “श्रद्धावान लभते ज्ञानम्” या वचनावर तुमचं दृढ विश्वास आहे का?

४. सद्गुरूंनी सांगितलेला जप केला पण अनुभव आला नाही. अशा वेळी मनात कोणते विचार येतात? तुम्ही त्याला कसे सामोरे जाता?

५. संत सोहिरोबांची ओळ “हरी भजनावीण काळ घालवू नको रे” हे मला माझ्या व्यस्त आयुष्यात कसे साधता येईल?

– क्रमशः श्लोक श्लोक ६१ आणि ६२.

© श्री विश्वास देशपांडे

चाळीसगाव

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ निमित्त… कवयित्री : अनामिका ☆ प्रस्तुती : उषा नाईक ☆

उषा नाईक

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ निमित्तकवयित्री : अनामिका ☆ प्रस्तुती : उषा नाईक ☆

 स्वयंपाकघरात शिरायला

आताशा नको वाटतं

खावंसं वाटतं पण

करायला नको वाटतं

पूर्वी करून दाखविण्याची

महाभयंकर हौस होती

स्वतःला सिद्ध करण्याची 

चांगलीच खुमखुमी होती

 *

थोडी इतरांनाही  संधी द्यावी

आता असं वाटत राहतं

स्वयंपाकघरात शिरायला

आताशा नको वाटतं

 *

चविष्ट काही केलं की

वजनाकडे लक्ष जातं

पौष्टिक करायचं म्हटलं की

तोंडाचं पाणी पळतं

 *

जीभ आणि पोटाचं

भांडण कधी थांबत नसतं

स्वयंपाकघरात शिरायला

आताशा नको वाटतं

 *

सकाळ संध्याकाळ काय करावं

प्रश्नचिन्ह सतावत असतं

चहा आयता मिळाला की

मनापासून बरं वाटतं

 *

कमी खावं म्हटलं तर

भुकेनी डोकं दुखतं

स्वयंपाकघरात शिरायला

आताशा नको वाटतं

 *

सगळे चेष्टा करू लागले

वय झालं’ म्हणू लागले

ती कुजबुज कानी पडता

मनोमनी भांबावले

 *

खरंच काय कारण असावं

अंतरंग शोधू लागतं

स्वयंपाकघरात शिरायला

का बरं नको वाटतं ?

 *

परमेश्वरी इच्छा असेल

संसारातून  बाहेर पडावं

हळूहळू निवृत्त होत 

वैराग्याकडे वळावं

 *

स्वयंपाकघराच्या निमित्ताने

मन सूचना देत असतं

स्वयंपाकघरात शिरायला

टाळाटाळ करत असतं

कवयित्री : अनामिका

प्रस्तुती :  उषा नाईक

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ अशीही प्रचिती… ☆ नीलांबरी शिर्के ☆

नीलांबरी शिर्के

?️?  चित्रकाव्य  ?️?

☆ अशीही प्रचिती नीलांबरी शिर्के 

इवल्या इवल्या पोरांनाही 

कळू लागलंय आता

फूल तिचा माईक झाला

स्टॅन्डसह पुढे येता!!

*

टक टक करून खात्री

करून घेतेय ध्वनीची

आजू बाजूचेच शिकती पोरं 

प्रचिती येते इथे त्याची!!

©  सुश्री नीलांबरी शिर्के

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /मंजुषा मुळे/गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ आपली मुंबई… ☆ स्वाती विकास गाडेकर ☆

स्वाती विकास गाडेकर

? कवितेचा उत्सव ?

आपली मुंबई... ☆ स्वाती विकास गाडेकर ☆

ही मुंबई, आम्हा सर्वांच्या जीवाभावाची..

सगे-सोयरे मित्र परिवार, सर्वांच्याच लाडाची!!

 *

मुंबई आजची, आणिक कालची..

तशी वेगळी, पण सर्वांच्याच प्रेमाची!!

 *

राजी खुशीने, नांदती सखेसाबती..

जीवाला जीव देणे, हीच मुंबईकरांची ख्याती!!

 *

नाही झोपत मुंबई कधीही..

अशी महती असे, जगात अत्रतत्र सर्वत्रही!!

 *

राहती खोपट्यात-झोपडीत आनंदाने..

तशीच राहती, बिल्डिंग अन् बंगल्यात सुखाने!!

 *

समुद्र असे, तिची अस्सल शान..

ट्रॅफिक जॅम चा, मुंबईकर सदा गुलाम!!

 *

लोकल ट्रेन, असे तिची जीवनवाहिनी..

सदा तत्पर असे, सर्वांसाठी मान उंचाऊनी!!

सजलेली ही मायानगरी नटनट्यांनी..

आर्थिक उद्योगाची, नावाजलेली राजधानी!!

 *

इतका मुंबईचा पसारा मोठा..

चारही टोके कुणीही सहज गाठा!!

 

© स्वाती विकास गाडेकर

ए१०२, गगनगिरी सोसायटी, सेक्टर १७, वाशी, नवी मुंबई, ४००७०३ मो ९८३३७००५७१

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ मनाचे श्लोक – एक सार्वकालिक ‘मनोपनिषद’… – श्लोक श्लोक ५९ आणि ६० ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्री विश्वास देशपांडे

? इंद्रधनुष्य ?

☆ मनाचे श्लोक – एक सार्वकालिक ‘मनोपनिषद’… – श्लोक ५९ आणि ६० ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्लोक क्र. ५९ – – – 

मना कल्पना कल्पिता कल्पकोटी |

नव्हे रे नव्हे सर्वथा रामभेटी |

मनी कामना राम नाही जयाला |

अति आदरे प्रीति नाही तयाला ||५९||

अर्थ : हे मना, नाना प्रकारच्या अनंत कल्पना तू करीत राहिलास तर भगवंताचे दर्शन कदापिही शक्य नाही. ज्याच्या अंतरात वासना असतील, त्याच्या मनामध्ये भगवंताविषयीची कामना निर्माण होणे शक्य नाही आणि भगवंताविषयी कामना नसेल तर त्याच्यावर आदरयुक्त प्रेम कसे राहील?

(कल्पिता – कल्पना करणे, कल्पकोटी – अनंत/ नाना प्रकारच्या)

विवेचन : आपल्या जीवनात कल्पनेचे देखील काही एक विशिष्ट स्थान आहे. आपल्या मनातील कल्पना चांगल्या आणि विधायक असतील तर व्यवहारात त्या प्रत्यक्षात येऊ शकतात, त्यांचा उपयोग होतो. परंतु त्या कल्पनांना जर योग्य दिशा नसेल आणि त्या विधायक नसतील तर त्या जीवनाचा नाश करू शकतात. सदैव कल्पनेच्या राज्यात रमणारा माणूस व्यवहारात अयशस्वी होतो. त्याला धड प्रपंचही जमत नाही आणि धड परमार्थही तो करू शकत नाही. अशी अनेक उदाहरणे आपण आपल्या अवतीभवती नेहमी पाहतो.

समर्थांनी दासबोधात सांगितले आहे की आधी प्रपंच करावा नेटका मग घ्यावे परमार्थ विवेका. ज्याला प्रपंच नीट करता आला नाही त्याला परमार्थ कसा जमणार? म्हणून आपल्याला यशस्वी प्रपंच करून परमार्थाकडे वाटचाल करायची आहे. अस्थिर मनाने प्रपंच आणि परमार्थ ही साधणार नाही.

कल्पना करीत राहणे हा मानवी स्वभाव आहे. या कल्पनाच आपल्याला विषयांच्या राज्यात घेऊन जातात आणि त्यांच्या तीव्र ओढीने विषयांचे सेवन आपल्याकडून घडते. साहजिकच भगवंतापासून आपण दूर जात असतो. ज्याप्रमाणे एका म्यानात दोन तलवारी राहू शकत नाहीत, त्याप्रमाणे मनामध्ये विषय चिंतन आणि भगवंत या दोन्ही गोष्टी एकाच वेळी राहू शकत नाहीत. मन एकाच गोष्टीला पूर्णपणे वाहिले पाहिजे.

परमार्थाकडे वाटचाल करताना मनामध्ये वासना असता कामा नये. वासना असतील तर आपल्याला भगवंत हवा, अगदी मनापासून हवा असे वाटणारच नाही. जोपर्यंत आपल्याला भगवंत हवाच आहे असे मनापासून वाटत नाही तोपर्यंत त्याच्याबद्दल प्रेम निर्माण होणार नाही.

भगवंत हवा आहे असे मनापासून वाटत असेल तर विषयाकडे धावणारी वृत्ती सवयीने हळूहळू कमी करायला हवी. त्यासाठीच नामस्मरण, पूजा, सत्संग, साधना इ. गोष्टी सांगितल्या आहेत.

पण विषयाकडे धावणारे मन नाना प्रकारच्या कल्पना करीत राहते. मनाची शक्ती अपार आहे. परंतु आपण या शक्तीचा योग्य वापर करण्यापेक्षा गैरवापरच जास्त करीत असतो. दिशाहीन आणि निरुपयोगी कल्पना मनाला थकवा आणतात. म्हणूनच मनाला प्रयत्नपूर्वक योग्य मार्गावर आणायला हवे आणि त्याला योग्य दिशा द्यायला हवी. मला भगवंत हवा आहे अशी निव्वळ इच्छा करून तो प्राप्त होणार नाही. तर त्यासाठी प्रयत्न करावे लागतील. विवेक आणि वैराग्य धारण करावे लागेल. भगवंत हवा असेल तर अन्य सर्व इच्छांचा त्याग करून त्याच्या प्राप्तीसाठी प्रयत्न केले पाहिजेत. एखाद्या गोष्टीचा नित्य सहवास लाभला की त्याबद्दल आपल्याला प्रेम निर्माण होते. त्याप्रमाणेच सतत भगवंताचे नाम घेत गेल्याने त्याच्याबद्दल आदरयुक्त प्रेम निर्माण होईल.

स्वसंवाद ::

१) माझ्या मनात दिवसभर कोणत्या प्रकारच्या कल्पना सर्वाधिक येतात – विधायक की विषयप्रधान?

२) मी वास्तवात जगतो का, की कल्पनांच्या जगात जास्त वेळ घालवतो?

३) मला खरोखर भगवंताची ओढ आहे का, की ती केवळ एक वरवरची इच्छा आहे?

४) मी माझ्या मनाला जाणीवपूर्वक योग्य दिशेला वळवण्यासाठी काही प्रयत्न करतो का (नामस्मरण, वाचन, सत्संग)?

– – – – – 

श्लोक क्र. ६० – – – 

मना राम कल्पतरू कामधेनू |

निधी सार चिंतामणी काय वानू|

जयाचेनि योगे घडे सर्व सत्ता|

तया साम्यता कायसी कोण आता |६०|

अर्थ : हे मना राम म्हणजे भगवंत कल्पतरू, कामधेनू आहेत. ते निधी, सार, चिंतामणी… सारे सारे काही आहेत. हे सगळे शब्द त्यांचे वर्णन करण्यासाठी कमी पडतात म्हणून समर्थ म्हणतात की त्यांचे कसे आणि काय वर्णन करू? त्यांच्याच योगाने आणि सत्तेने सर्व काही घडत आहे. त्यांची तुलना किंवा साम्य कशाशी दाखवता येईल?

(चिंतामणी – इच्छिलेली वस्तू देणारा, वानू – वर्णन करू)

विवेचन : या श्लोकात समर्थ श्रीरामांच्या भक्तीची महती आपल्याला सांगतात. श्रीरामांबद्दल बोलताना त्यांनी वेगवेगळी विशेषणे वापरली आहेत. श्रीराम कामधेनू, कल्पतरू, निधी सार, चिंतामणी सारे सारे काही आहेत असे समर्थ म्हणतात. या एकेक शब्दाचा अर्थ आपण लक्षात घेऊया.

कल्पतरू म्हणजे इच्छिलेले सर्व काही देणारा एक वृक्ष. त्याच्या छायेत बसून जी कल्पना करावी ते सर्व आपल्याला प्राप्त होते. कामधेनू म्हणजे इच्छिलेले सर्व काही देणारी दिव्य गोमाता. निधी म्हणजे कुबेराचे भांडार किंवा खजिना, चिंतामणी म्हणजे इच्छिलेले सर्व काही देणारा काल्पनिक मणी.

प्रभू रामचंद्र भक्तांचे सर्व मनोरथ पुरवणारे आहेत. ते कल्पतरू, कामधेनू आहेत. आपल्या भक्तांना काहीही कमी पडणार नाही याची काळजी ते घेतात. इच्छिलेले सर्व काही देणारे ते आहेत. ते निधी म्हणजे कुबेराचे भांडार आहेत. कुबेराचे भांडार म्हणजे समृद्ध खजिना! कशाचीही कमी नाही. म्हणजेच श्रीरामाच्या भक्तांना कसलीही कमी पडणार नाही. त्यानंतर समर्थ म्हणतात की ते सार आहेत. सार म्हणजे महत्त्वाचे तत्व! या विश्वामध्ये सार म्हणजे फक्त एक श्रीराम. बाकी सर्व काही असार. एका वाक्यात सांगायचे झाले तर रामनाम ही सर्व कुलुपांची अशी एक किल्ली आहे की ज्यामुळे सर्व कुलुपे विनासायास उघडतात.

संत ज्ञानेश्वरांनी आपल्या पसायदानात परमेश्वराला प्रार्थना करताना म्हटले आहे, “जो जे वांछील, तो ते लाहो. ” म्हणजे ज्याला ज्याला जी जी इच्छा होईल ती ती गोष्ट प्राप्त होवो. अर्थात या ठिकाणी इच्छा म्हणजे सदिच्छा किंवा चांगली इच्छा हे गृहीत आहे. भक्ताच्या चांगल्या इच्छाच भगवंत पुरवेल. आणि श्रीरामांच्या भक्तांना वाईट इच्छा कशी होईल? म्हणून आपल्या भक्तांच्या मोक्षाच्या, दर्शनाच्या सर्व कामना तो दयानिधी पुरविल.

वर निधी म्हणजे कुबेराचा खजिना असे आपण म्हटले आहे. परंतु निधी या शब्दाचा अर्थ या ठिकाणी आणखी वेगळा आणि थोड्या व्यापक अर्थाने घेता येईल. निधी म्हणजे साठा. निधी म्हणजे समुद्र. श्रीराम म्हणजे गुणांचा साठा, दयेचा आणि करुणेचा समुद्र. आपल्या भक्तांची कधीही उपेक्षा न करणारा असा तो आहे. त्याच्या गुणांचे काय वर्णन करावे? त्यासाठी शब्द कमी आहेत. तो कोणासारखा बरं आहे? तर त्याच्यासारखा तोच!

अनंत हस्ते कमलावराने, देता किती घेशील दो कराने? असा तो आहे. तो द्यायला बसला की आपली झोळी अपुरी पडेल. म्हणून काही मागायचे तर त्याच्या जवळच मागावे. जो सगळे काही आहे जो, सारसर्वस्व आहे, त्याच्याजवळ मागण्याचे सोडून इतरांजवळ मागण्यात काय हशील?

व्यवहारामध्ये आपली इच्छापूर्ती किंवा वासनापूर्ती करणारी सारी साधने गौण आहेत. त्या इच्छा, त्या वासना कधी संपतच नाहीत. भगवंत जेव्हा आपली इच्छापूर्ती करतो, तेव्हा काही मागायचे राहतच नाही. संत तुकाराम महाराज म्हणतात, ” काय उणे आम्हा विठोबाचे पायी? ” अशी भक्ताची अवस्था होते. मन शांत, तृप्त होते आणि अत्यंत सामर्थ्यशाली बनते. कोणतीही आणि कशीही विपरीत परिस्थिती आली तरी ज्याची भगवंतावर श्रद्धा आहे, असा भक्त डगमगत नाही. असे समाधान देणारा भगवंत हा एकमेवाद्वितीय आहे. त्याची बरोबरी कशानेही होणार नाही.

स्वसंवाद :: 

१) मी माझ्या इच्छा पूर्ण करण्यासाठी बाह्य साधनांवर जास्त अवलंबून आहे का, की परमेश्वरावर विश्वास ठेवतो?

२) “मला अजून काही हवे आहे” ही भावना माझ्यात कितपत आहे? की “काय उणे आहे? ” अशी तृप्ती आहे?

३) मी जे मागतो, ते खरोखर माझ्या कल्याणासाठी आहे का, की केवळ वासनापूर्ती आहे?

४) माझ्या जीवनात “सार” आणि “असार” यातील फरक मला स्पष्टपणे कळतो का?

५) मला भगवंत “सर्वस्व” वाटतो का, की अजूनही इतर गोष्टींमध्येच माझा जास्त विश्वास आहे? (क्रमशः)

– क्रमशः श्लोक श्लोक ५९ आणि ६०.

© श्री विश्वास देशपांडे

चाळीसगाव

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ देवा, तुझी सिस्टम अपग्रेड कर… – कवी : अज्ञात ☆ प्रस्तुती – गौरी गाडेकर ☆

गौरी गाडेकर

📖 वाचताना वेचलेले 📖

देवा, तुझी सिस्टम अपग्रेड कर… – कवी : अज्ञात ☆ प्रस्तुती – गौरी गाडेकर

काळ्या ढगांवर देवा

क्लिक कर ना माउस

आमच्या पृथ्वीवर आता

पाड ना धो धो पाऊस

पृथ्वीच्या स्क्रीनवर देवा

सिमेंटच्या जंगलांचा कहर

बदलून दे ना आता

हिरवागार स्क्रीन सेव्हर

 *

ऋतू चक्राचे सॉफ्टवेअर

देवा करून घे अपडेट

नाहीतर उन्हाळ्यात गारा

अन पावसाळ्यात ऊन थेट

 *

जास्त पाणी साठवण्या

हार्ड डिस्कची वाढवून घे जागा

पावसासाठी आम्हाला का

करावा लागतो त्रागा

 *

समुद्री वादळांचा धोका

मान्सूनला नेतो पळवून

त्यांचा बंदोबस्त कर तू

ANTI वायरस चालवून

 *

पाऊस झटपट पाडण्या

देवा वाढवून घे RAM

नाहीतर म्हणावे लागेल

आम्हाला हे राम

 *

देवा इंजिनिअर बोलावून

सिस्टम अपग्रेड करण्यास सांग

नाहीतर पावसावाचून आमचे

जगणे व्हायचे HANG…

कवी : अज्ञात

प्रस्तुती : गौरी गाडेकर

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ विजय साहित्य # २९८ – मला तुझ्यात शोध तू…! ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆

कविराज विजय यशवंत सातपुते

? कवितेचा उत्सव # २९८ – विजय साहित्य ?

☆ मला तुझ्यात शोध तू….! कविराज विजय यशवंत सातपुते ☆

(वृत्त कलिंदनंदिनी.)

चुकेन मी, तरी पुन्हा, वसेन माणसात मी

मला तुझ्यात शोध तू, दिसेन काळजात मी. . . . !

*

मनास सागणे नको, जपावयास गोडवा

हसून गोड बोल तू, फसेन आरशात मी. . . . !

*

उगाच फूल लाजले , तुला उन्हात पाहता

पहा जरा स्वतःकडे, असेन त्या फुलात मी . . . !

*

मनामनात होतसे , क्षणाक्षणात कालवा

हवेत थांब मोकळ्या , घुसेन कुंतलात मी. . . !

*

निघून दूर चालली, प्रवास दूरचा जरी

अबोल प्रीत छेड तू, शिरेन अंतरात मी

*

खुशाल वाट चाल तू, चुकू नको नव्या पथा

नसेन सोबतीस मी, बसेन आठवात मी. . . !

*

विशाल त्या पथावरी, जपून टाक पावले

नसेन मी तुझा जरी, उरेन आसवात मी. . . . !

© कविराज विजय यशवंत सातपुते

सहकारनगर नंबर दोन, दशभुजा गणपती रोड, पुणे.  411 009.

मोबाईल  8530234892/ 9371319798.

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares