मराठी साहित्य – जीवनरंग ☆ तुला पावू दे.. आम्हाला खाऊ दे… ☆ मंजुषा सुनीत मुळे  ☆

मंजुषा सुनीत मुळे

? जीवनरंग ?

☆ तुला पावू दे.. आम्हाला खाऊ दे ☆ मंजुषा सुनीत मुळे 

“ अगं आज दिवसभरात तू सकाळची पुरवणी पाहिलेली दिसत नाहीये.. ”

“ का हो.. काही विशेष बातमी आहे का? “ 

“ हो तर.. आणि खरं तर ती तूच मला सांगशील म्हणून वाट पाहात होतो मी. हे बघ.. नेहेमी ज्या हॉलमध्ये फक्त गार्डनचा सेल लागतो, त्याच हॉलमध्ये अजून मोठा सेल लागलाय म्हणे. “

“ बघू बघू.. “ –

– – मोदकासाठी सारण करत असलेल्या सविताबाई तशाच लगेच आल्या आणि अशोकरावांच्या हातातलं पेपरचं ते पान त्यांनी पट्कन ओढून घेतलं… “ सुवर्णा गॅस बारीक कर आणि सारण सारखं हलवत रहा.. आलेच मी.. “ असं म्हणत त्यांनी शेजारच्या टेबलावर ते पान पूर्ण उघडून ठेवलं…आणि खुर्चीत टेकल्या.

खूप मोठी पानभर जाहिरात.. इतर बातम्या न वाचण्याचा option नेहेमीच असतो त्यांना, पण साड्यांच्या सेलची जाहिरात म्हटल्यावर अथपासून इतिपर्यंत वाचलीच पाहिजे असा जणू दंडकच होता त्यांच्यासाठी….. त्या सेलमध्ये भारतात तयार होणाऱ्या सर्व प्रकारच्या साड्या असणार होत्या… त्याही

‘ आकर्षक ‘ डिस्काउंटसकट.. (आणि प्रत्यक्षात त्या साड्या आकर्षक असोत वा नसोत.. डिस्काऊंटला मात्र “आकर्षक” हे विशेषण असायलाच हवं असं बहुतेक संविधानातच लिहिलंय की काय या विचाराने अशोकरावांना हसू आलं)

ती जाहिरात पूर्ण वाचून झाल्यावर त्यांनी सुवर्णाला (कधी नव्हे ती) आपुलकीने हाक मारली.. “ अगं इकडे ये पटकन.. ही जाहिरात बघ.. “ 

– आणि कधी नव्हे ती एवढी प्रेमळ हाक ऐकून ‘ गॅसवरचं सारण शिजलंय नीट ‘ असं गृहीत धरून सुवर्णाने झटदिशी गॅस बंद केला आणि ती पळतच तिथे गेली …. आणि मग घड्याळाचे काटेही जणू फिरायचं विसरले. त्या सेलमधल्या अजून पाहिलेल्याही नसलेल्या साड्यांमध्ये दोघी अगदी हरवून गेल्या. (‘ मी मज हरपून बसले sss गं ‘ हे गाणं बहुतेक यांच्यासारख्या बायकांकडे बघूनच सुचलं असावं हा विचार मनात येऊन अशोकराव स्वतःशीच हसत तिथून उठले.) आणि दोघींचं चक्क एकमत झालं.. ठरलं – – “ उद्या सकाळी पटापट कामं आवरू आणि जाऊ हे प्रदर्शन बघायला.. “ (.. हे वाक्य तर गृहीतच धरलं होतं अशोकरावांनी. आता साडी-खरेदी या आत्यंतिक जिव्हाळ्याच्या विषयाबाबत सासू-सुनेत खडाष्टक योग डोकावणं कधीतरी शक्य होईल का? नाहीच … असं गृहीत धरून अशोकराव निर्धास्त झाले.)

ती पानभर जाहिरात बारकाईने वाचत वाचत पानाच्या शेवटच्या टोकाशी आल्यावर दोघीही एकदम दचकल्या…. एक लहानशी चौकट.. “ आज चंद्रोदय रात्री ८ वाजून ४७ मि. “ … आणि घड्याळाची टकटक अचानक सुरू झाली. चक्क आठ वाजून गेले होते, मोदकाचं सारण सोडलं तर सगळा स्वयंपाक व्हायचा होता.

सविताबाई नाईलाजाने उठल्या. ‘ ही चतुर्थी म्हटलं ना की ‘ असं स्वतःशीच पुटपुटत त्यांनी घाईघाईने गॅसवर कुकर चढवला … आणि उशीर झाल्यामुळे, कुकरला प्रेशर येण्याआधी त्यांचं ब्लड प्रेशरच बरंच वाढलं होतं. सुवर्णा खरंतर अगदी पटापट भाजी चिरत होती, पण त्या नादात “ कान्दा राहिला हातात आणि सुरी गेली की बोटात.. ‘ आई ग्ग ‘ ती कळवळली.. आणि कुकरची शिट्टी दोन ठिकाणी वाजली … सविताबाई तिच्यावर आधी एकदा खेकसल्या होत्याच.. “ अगं किती हा संथपणा.. आवर पटकन आणि लगेच तांदळाची पिठी काढ परातीत. ”.. आणि आता परत.. “ साधी भाजी चिरायलाही शिकून आली नाहीयेस का माहेराहून “.. त्यांचा टोन ऐकून ती घाबरली आणि तिचं बी. पी. घसरायला लागलं बहुतेक.. सून म्हणून नुकतीच तर आली होती ती त्या घरात … बावरून गेली एकदम.. कुठे काय ठेवलेलं असतं हेही कळलं नव्हतं अजून तिला.. कापलेलं बोट तोंडात धरलं आणि तांदुळाची पिठी समजून चुकून तिने मैदा काढला परातीत. पटकन भाजी फोडणीला टाकून सुनीताबाईंनी गॅसवर उकडीसाठी पाणी तापत ठेवलं आणि परात पुढे घेतली.. आणि झालं … तो मैदा पाहून त्यांचा संताप उतू जाणाऱ्या दुधासारखा अनावर झाला

…तोंडाचा दांडपट्टा सुरु होताच …. “ काहीच शिकवून पाठवलेलं दिसत नाहीये आईने.. साधा मैदा आणि पिठीतला फरक कळत नाही.. त्या डिग्र्या काय चाटायच्यात? उंडगी कुठली “ … बडबड करतच त्या स्वतः कपाटातला पिढीचा डबा काढायला गेल्या.. आणि सुनेकडे रागाचे कटाक्ष टाकण्याच्या नादात त्यांच्या हातून तो डबा चक्क धारातीर्थी पडला. “ आता कसा दाखवणार आहे मी मोदकाचा नैवेद्य.. की नुसतं सारण देवापुढे ठेवून म्हणू की बाबा हेच मोदक आहेत असं समज आणि पावन करून घे म्हणून ”.. आता आवाज अगदी टिपेला पोहोचलेला.. नेहेमीसारखाच.

…… धाड्कन आवाज ऐकून अशोकराव स्वैपाकघरात आले. बायकोच्या चेहेऱ्यावरचा उकळता संताप आणि सुनेच्या डोळ्यातून घळाघळा ओघळणारं पाणी पाहून सगळी परिस्थिती त्या अनुभवी नवऱ्याच्या लगेच लक्षात आली. भेदरून उभ्या असलेल्या सुनेला त्यांनी प्रेमळ नजरेनेच दिलासा दिला, आणि बायकोला म्हणाले … “ अगं असू दे.. होतं असं कधीतरी. हे बघ बाकी सगळा स्वैपाक झालाय ना… मग यावेळी मोदक राहू देत… गूळ खोबऱ्याचं सारण तयार आहे ना… आज त्याचाच नैवेद्य दाखव. मोदक राहू देत. गणपती काही संतापणार नाही तुझ्यासारखा. आणि तू आता पूजा करायला जा बघू.. सुवर्णा पट्कन पोळ्या करेल…” सुवर्णाने लगेच मान हलवली. सविताबाईंना ऐकण्याशिवाय पर्याय नव्हताच. तोंडाने बडबड आणि डोळ्यांनी तीक्ष्ण कटाक्ष टाकतच त्या पूजेसाठी देवघरात आल्या…अर्थात पूजा यांत्रिकपणे सुरू झाली.. गणपतीला त्याचं काही वाटलं नसावं कारण हा अनुभव काही नवा नव्हता त्याच्यासाठी… हा विचार अशोकरावांच्या मनात आल्याशिवाय राहिला नाही. पण आता ते एका वेगळ्याच कारणाने हळूच हसत होते.. ‘उद्याची यांची प्रदर्शन भेट मनातला राग आणि ते सारण पचेपर्यंत तरी पुढे ढकलली जाणार आणि तितके दिवस माझा खिसा सुरक्षित राहणार’या विचाराने. असो.

… देव बिचारे समजुतदार… झाली तशी पूजा करुन घेतली त्यांनी.. नेहेमीसारखीच मुकाट्याने … आणि त्या बाहेर आल्या… इतक्यात सुवर्णा सारणाची वाटी घेऊन समोर आली… ‘‘आई हाच नैवेद्य दाखवणार ना आज? कुठे ठेऊ? देवळातच नेऊन ठेवू? ” … झालं… सविताबाई पुन्हा तिच्यावर डाफरल्या…. आणि तसंही आता डाफरण्यासाठी खरं तर एखाद्या valid कारणाची गरजच नव्हती ना?

‘‘काय म्हणालीस? देवळात ठेवायला नैवेद्य? कुठल्या देवळात जायचंय? ” सुवर्णाने काही न बोलता देवघराकडे बोट दाखवलं…

‘‘बाई बाई बाई …कमाल झाली आता… अगं याला देवघर म्हणतात… देऊळ नाही… कितीदा सांगायचं तुला? ”

‘‘सॉरी आई… पण माझ्या माहेरी याला देऊळच म्हणतात… तेच आठवलं मला…”

‘‘आता विसरा माहेरची कौतुकं… देऊळ म्हणे… काय काय चुकीचं शिकवून पाठवलंय कोण जाणे आई-बापांनी…” आणि सविताचा संपत आलेला संयम आता पारच संपला… आणि बहुतेक गणपतीचाही संपलाच असावा. … 

विषय अनिर्बंध भरकटत चालला होता. एव्हाना मुलगा सुजीतही घरी आला होता. पण अशोकरावांनी लगेच त्याला बाजूला घेऊन परिस्थिती सांगितली. तो बिचारा वडलांवर गेलेला. गुपचूप खोलीत जाऊन कपडे बदलून आला आणि पानं घ्यायला लागला… सुवर्णा पुढे आली. तिला हातानेच थांबायची खूण केली. तोपर्यंत अशोकराव फक्त नैवेद्याची वाटी घेऊन देवघरात गेले आणि गणपतीची क्षमा मागत नैवेद्य दाखवून बाहेर आले. सगळ्यांनाच भूक लागली होती… सगळे गुपचुप जेवायला बसले… बाप्पालाही नक्कीच अगदी हुश्श झालं असणार.

….. आणि मी? सविताच्या घराच्या बरोब्बर समोर आमच्या घराचं दार ना! समोरच्या घरात मोठमोठ्याने बोलणं ऐकू आलं… मग मी घरात कशी बसून राहू शकते हो? मी माझ्या दारात उभी राहून कानोसा घेऊ लागले. शेजारीण म्हणून जणू आद्य कर्तव्य होतं ते माझं. पण ते भांडण एन्जॉय करण्यात माझा किती वेळ गेला कोण जाणे… आता समोर सारे कसे शांत शांत भासत होते… मग मीही नाईलाजाने घरात जायला वळले……

आणि.. आणि अचानक कुणीतरी माझ्या खांद्यावर थोपटलं… ‘‘चला… गॅसवरची भाजी करपून कोळसा झालाय तिचा आता…” मी दचकून वळून पाहिलं आणि घाबरलेच… चक्क बाप्पा उभा होता माझ्याकडे हसून बघत…

‘‘ झाली ना इतरांची भांडणं एंजॉय करुन? आणि काय गं.. इतकी मैत्री आहे ना तुझी त्या सविताशी? आणि स्वत:ला खूप प्रगल्भ विचारांची समजतेस ना? … म्हणजे अहंकारच बाळगतेस की त्यासाठी… मग जाऊन सांगायचंस ना तिला की तिच्या चिडचिडीला काहीच अर्थ नाही म्हणून. अगं मारे प्रवचने देतेस ना की… देव सर्वत्र आहे… देऊळ, देवघर, देवालय, मंदिर.. काहीही म्हटलं तरी देव तिथे असतो कुठे? ‘सर्वाभूती परमेश्वर’ असं शिकवतेस ना इतरांना…आणि देव फक्त भावभक्तीचा भुकेला असतो हेही सांगतेस की शहाजोगपणा करत.. ठेक्यावर गाणीबिणी गात. पण तुझा हा वस्तादपणा माझ्यापासून लपला नाहीये हे लक्षात ठेव कायमचं. … ‘इथे ज्ञान पाजळल्याबद्दल कुणी हार घालणार नाही… समोर तबकही नाही… मग कशाला पडायचं या भानगडीत? ’ असाच विचार केला असशील… बरोबर ना? … खोटारडी कुठली.. आता तरी सुधारा रे… देवाला काय आवडतं… मोदक… की खीर… की श्रीखंड…. हे तुम्हीच ठरवा.. तुम्हाला काय खावंसं वाटतंय त्यावरून.. भोज्याला शिवून यावं तशी नैवैद्याची वाटी देवासमोर ठेवायची आणि लगेच आणून आपल्या ताटात ठेवायची की झाली पूजा पूर्ण… असंच ना? नाही गं नाही… मनापासूनचा एक नमस्कार आणि मनातली समर्पण भावना एवढंच अगदी हवं असतं गं आम्हाला … असो… मी सांगतोय ते काहीच तुझ्या डोक्यात.. खरंतर मनात शिरत नाहिये हे कळलंय मला तुझा चेहेरा पाहून… मी तरी का तुझं भलं करायला चाललोय… जाऊ दे …. आदतसे मजबूर हेच कारण आम्हा भोळ्या भाबड्या देवांचं…. असो.. आता त्या सवितासारखा तणतणत का होईना पण करणार आहेस की नाही मला नैवेद्य दाखवण्याचा ‘उपचार’? अगं तुलाच जे्वायला उशीर झाला की चक्कर येते असं सांगून सगळ्यांच्या आधी जेवून घेतेस नेहेमी हे इतरांना नसलं तरी मला माहितीये हे विसरू नकोस. आणि हो.. नैवेद्याच्या ताटात ती करपलेली भाजी तेवढी वाढू नकोस हं प्लीज…कारण ती मला नाही तर तुलाच खावी लागेल ना मग? … नाहीतर उद्या बाईला दे…. मी त्याबद्दल काही बोलणार नाही आणि ती बाई बिचारीही काही बोलणार नाही.. माझीच मनापासून भक्ती करते ती. आणि हो… मला जेवायला घातलंस अशी भ्रामक आणि निरर्थक समजूत करून घेतांना म्हणायला अजिबात विसरू नकोस बरं …. “ देवा तुला पावू दे… आम्हाला खाऊ दे…” 

आणि बाप्पा दिसेनासा झाला…

 

© मंजुषा सुनीत मुळे

सांगली 

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित / मंजुषा मुळे/ गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ “डिलिव्हरी बॉय!!!” – भाग २ ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

डॉ अभिजीत सोनवणे

© doctorforbeggars 

? मनमंजुषेतून ?

☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ “डिलिव्हरी बॉय!!!” – भाग २ ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

(ओह, माझ्याकडची एक मोठी बॅग, गाडीला अडकवलेल्या तशाच दोन मोठ्या बॅगा, जशा Swiggy Zomato किंवा कुरिअर यांच्या डिलिव्हरी बॉईज कडे असतात तशा… हे पाहून आजीने अंदाज बांधला मी सुद्धा डिलिव्हरी बॉय आहे.

… हाताने बॅग शोधणे सुरूच होते.) 

इथून पुढे – – – 

आजीकडे दुसरे गिऱ्हाईक नव्हते, ती उघड्या डब्याचे झाकण लावत, उघड्या कढईवर मोठं भांड ठेवत, पदराला हात पुसत आपुलकीने विचारू लागली, ‘तु अमुक अमुक दुष्काळी भागातला ना रे? माझ्याकडे खूप मुले येतात त्या भागातली बेटा. ‘

‘आई वडील काय शेताकडे मजुरी करतात का…?

शिक्षण किती झालंय तुझं? दहावी तरी पास आहेस का…? लग्न झालंय का? पोर बाळ काही आहे का? ‘

आजीचे प्रश्न संपत नव्हते. आजी टपरीतलं इकडं तिकडं पडलेलं साहित्य आवराआवरी करत विचारत होती. मध्येच पदरानं तोंड पुसत होती.

मी तिला म्हणालो, ‘आजी मी डॉक्टर…

पुढचं बोलू न देता ती मला म्हणाली ‘ हां, अरे सगळीच खेड्यातली गरीब मुलं डॉक्टर, इंजिनियर, अधिकारी व्हायची स्वप्न घेऊन येतात, पण सगळ्यांची स्वप्न पूर्ण होत नाहीत बाळा’ 

‘असू दे, आता जिथे नोकरी करतोयस तिथे करत रहा, पुढे नशीब पालटेल, फक्त कष्ट करत रहा प्रामाणिकपणे… रडायचं नाही बेटा लढायचं… ‘

‘आता ज्या कंपनीत डिलिव्हरी बॉय म्हणून काम करतोस तिथे किती दहा-बारा हजार तरी देतात का? एवढ्या पैशात पुण्यात राहायचं कसं आणि गावाकडे आई बापाला पैसे कसे पाठवायचे…? ‘ खरंच तिच्या चेहऱ्यावर चिंता पसरली.

थोड्या वेळात माझ्यासारख्या “डिलिव्हरी बॉय” ची दुःख तिची होऊन गेली… काही मिनिटातच ती मला आपलंसं करून गेली.

आजीचे प्रश्न अजूनही थांबत नव्हते.

तीच्याकडे गिऱ्हाईक म्हणून येणाऱ्या इतर सगळ्या डिलिव्हरी बॉईज मुलांचे अनुभव ऐकून, मीही त्यातलाच एक आहे हे समजून, तीने त्यांच्या व्यथा तिच्याही न कळत मला चिटकवून टाकल्या होत्या.

एव्हाना माझी बॅग सापडली, मी आजीला पैसे काढून देणार, इतक्यात विचार आला, आजी मला जो डिलिव्हरी बॉय समजत आहे, तेच तिच्या मनात राहू दे.

माझे भीक मागणाऱ्या लोकांमध्ये बसून मळलेले आणि चुरगाळलेले कपडे, पावसाने चेहऱ्याचा आणि केसांचा केलेला विकृत मेकअप, डिलिव्हरी बॉईज सारख्या बॅगा, कुठल्याही खिशात न सापडलेले पैसे आणि त्यात फाटलेला रेनकोट…!

या सर्वांमुळे गरीब घरातला आहे, हे समजून आजी माझ्याशी प्रेमाने बोलत होती आणि वागत होती.

मी डॉक्टर आहे वगैरे सांगितलं तर क्षणार्धात तिची माझ्याबद्दलची माया, कणव संपून जाईल.

आणि मी माझ्याबद्दल तिला सांगून तरी काय झेंडे लावणार होतो?

कारण ती स्वतः गरीब होती, आणि कष्ट करून जगत असलेल्या गरीब मुलांबद्दल तिला आपोआपच जिव्हाळा वाटत होता.

मलाही ती तेच समजली होती…

ती आईच्या रूपाने, देत असलेल्या जिव्हाळ्याच्या या दुधात, मी डॉक्टर आहे, असं सांगून मला मिठाचा खडा टाकायचा नव्हता.

तीच्या मनात जो गरीब मुलगा तिने रंगवला होता, मला ते चित्र पुसायचे नव्हते…!

आपलंसं समजून मनातल्या मनात माझ्याबद्दल वाळूचं घरटं जे तिने बांधलं होतं, मला ते विस्कटायचं नव्हतं 

खरंतर तीनं माझं रंगवलेले रूप मला आवडलं होतं…

हाच तर खरा आहे भिक्षेकर्‍यांचा प्रतिनिधी…!!!

पैशाची बॅग होती तिथे ठेवून आजीला म्हणालो, ‘आजी तीस रुपये माझ्यावर उधार… दोन दिवसात देतो. ‘

‘दे रे पगार झाल्यावर दिले तरी चालतील. मला कोणी फसवत नाही. ‘ 

नाही म्हणताना, उजव्या हाताचा पंजा, नाही, अशा अर्थाने, माझ्या चेहऱ्यासमोर नाचवत ती बेदरकारपणे म्हणाली.

‘फसवणारे फसवून गेले… ते सगळे माझेच होते, गोड बोलून माझ्याकडचं सर्व घेऊन निघून गेले, कुठे गेले मला माहित नाही. ‘ हे बोलताना मात्र ती भाऊक झाली.

‘कधीतरी वाटतं, भेटावं त्यांना शोधावं त्यांना… नातवंडं आता मोठी झाली असतील’

हे वाक्य बोलताना आजीच्या आवाजाला कंप सुटला, पुढे तिला बोलताच येईना, पुढचं सगळं आजीच्या डोळ्यातल्या पाण्याने सांगितलं… आजीनं डोळ्याला पदर लावला.

पुन्हा खाली मान घालून पदराने तिने डोळे पुसले.

पण पुढच्याच क्षणी पदर झटकून, खंबीरपणे चढ्या आवाजात म्हणाली, ‘जाऊदे शोधायचं तरी कशाला? शोध हरवलेल्यांचा घ्यायचा असतो, स्वतःहून गेलेल्यांचा नाही…!

‘हरवलं असेल तर नक्की सापडतं पण लपवून ठेवल्यावर माणसानं करायचं काय…? ‘ हुंदका देत ती म्हणाली.

‘माझं जाऊ दे तुझं सांग’ म्हणत शेजारच्या पातेल्यातून ओंजळीत पाणी घेऊन ते तिने चेहऱ्यावर सपासप मारलं.

मघाशी पाऊस माझ्या चेहऱ्यावर मारत होता तसंच…

फरक इतकाच, की मी पावसापुढे हार पत्करली आणि थांबलो या जागेवर…

आजीने परिस्थिती पुढे हार न मानता नवीन आयुष्याला सुरुवात केली होती याच जागेवर…

पाऊस आता थांबला होता तिच्या डोळ्यातलाही आणि आभाळातलाही…!

चार-पाच गिर्‍हाईकं आली होती. मी गाडीला किक मारून निघालो, तिचं माझ्याकडे लक्ष नव्हतं, ती वडे तळण्यात पुन्हा गुंगून गेली.

पैसे मिळतील की नाही याची तिला फिकीर नव्हती, तिच्या दृष्टीने तिने एका भुकेल्या नातवाला घास भरवला होता, आणि आजी कधी भरवलेल्या घासाचे पैसे मागत नाही…!

काय योजना होती ही पावसाची?

का मला निसर्गाने या आजीची भेट घालून दिली असावी…??

आणि पुन्हा पैसे परत करण्याच्या उद्देशाने परत भेटण्याची योजना सुद्धा करून ठेवली होती…

सगळंच अकल्पित आणि अतर्क्य…!

दोन दिवसांनी मी तिला भेटलो डिलिव्हरी बॉय म्हणूनच, मी 50 ची नोट काढून तिच्या हातावर ठेवली, उरलेले वीस राहू दे म्हणालो.

काय जहागीरदार आहेस का कुठला? ती माझ्यावर डाफरली.

‘असाच पैशाला पैसा जोडून घरी पाठवत जा’ उरलेले वीस रुपये देत ती मायेनं म्हणाली.

(मनात म्हटलं, ‘तुला देऊन घरीच पाठवतोय आजी… कसं सांगू तुला? ‘)

यानंतरही तिच्याकडे बऱ्याच वेळा गेलो, कधी वडापाव खायला, तर कधी गप्पा मारायला.

या गप्पांमधून चेहऱ्यावरच्या, एक एक सुरकुतीची कहाणी उलगडू लागली… हळू हळू धुकं विरळ होत गेलं आणि रस्ता स्वच्छ दिसू लागला…

सुरकुत्यांच्या या जाळ्यात खूप काही साठलं होतं, आणि आजी या जाळ्यात अडकली होती कोळ्यासारखी…!

आजी खरंतर एका श्रीमंत घरातली, तीला दोन मुलं. पतीने सर्व इस्टेट या आजीच्या नावे करून ठेवली होती.

मुलांची लग्न होईपर्यंत सर्व ठीक होतं, पण एकदा लग्न झाल्यानंतर घरामध्ये दोनाची चार डोकी झाली.

हि चार डोकी पद्धतशीरपणे आजीकडे स्वतःचा वाटा मागू लागली, त्यासाठी रोज वाद विवाद आणि भांडणे, मारामाऱ्या होऊ लागल्या.

घरातली भांडणे थांबवण्यासाठी आजीने सर्व प्रॉपर्टी दोन्ही मुलांमध्ये वाटून टाकली.

प्रॉपर्टी वाटली तरी सुद्धा मरेपर्यंत मी याच घरात राहणार अशी अट आजीने घातली.

घरात राहूनही, यानंतर आजीला कोणती सून जेवण देणार यावरून वादविवाद होऊ लागले. त्यातही पुन्हा मारामाऱ्या.

स्वाभिमानी आजी रागाने एका साडीवर घराबाहेर निघाली आणि एका फुटपाथ वर राहू लागली.

ओळखी पालखीचे लोक तेवढ्यापुरते सांत्वन करून पुढे जात, त्यातीलच एकाने, आजी तुम्हाला वडे करायला चांगले जमतात, तुम्ही हाच व्यवसाय का नाही करत असे सुचवले.

स्वाभिमानाने जगायचं तर काहीतरी करायला हवं, या विचाराने, ओळखीच्या लोकांकडून उधारीवर काही पैसे घेऊन व्यवसायाला लागणारी सामग्री घेतली आणि पुढे थोड्या अंतरावर रस्त्यावरील फुटपाथवर हा व्यवसाय सुरू केला. गोड बोलण्याने हळूहळू जम बसत गेला.

ऊन वारा पावसाचा त्रास होऊ लागला, म्हणून जी जोडलेली माणसं होती, त्यातील तरुणांनी चार काठ्या आणून त्यावर एक फ्लेक्स टाकून दिला.

आजीला निवारा मिळाला.

साधारण पाचशे रुपये रोज कमावते आजी…

बाकी सर्व नातवंडं समजून आमच्यासारख्या डिलिव्हरी बॉईज ना… उधारीवर…!

कोणी पैसे आणून देते, कोणी बुडवते तिला काही फरक पडत नाही…!

दर भेटीत मला वाईट वाटायचं, स्वतःची ओळख सांगायची सुद्धा चोरी…

एकदा मी तिला म्हणालो, ‘तुझी हि टपरी आपण छान करून घेऊया का? या चार काठ्या फेकून देऊन आपण छान काहीतरी कायमस्वरूपी करू…

ती भडकली, तु माझ्या शॉप ला टपरी म्हणतो…?

हि टपरी नाही माझं शॉप आहे… शॉप…!

सर्व काही असूनही काही लोक आनंदी नसतात, तर काहीच नसताना आजी समाधानी होती…!

ही टपरी म्हणजे तिचे शॉप होते…

– क्रमशः भाग दुसरा

© डॉ अभिजित सोनवणे

डाॕक्टर फाॕर बेगर्स, सोहम ट्रस्ट, पुणे

मो : 9822267357  ईमेल :  abhisoham17@gmail.com,

वेबसाइट :  www.sohamtrust.com  

Facebook : SOHAM TRUST

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “आनंदासाठी टॉनिक” ☆ श्री मंगेश मधुकर ☆

श्री मंगेश मधुकर

? मनमंजुषेतून ?

☆ “आनंदासाठी टॉनिक…” ☆ श्री मंगेश मधुकर

 — आनंदासाठी आपल्या माणसांच्या भेटी हे उत्तम टॉनिक.

 झालं असं की,

रविवारी निवांत होतो. घर, ऑफिस, मिटिंग्स, टार्गेटस, ईएमआयमध्ये गुरफटलेल्या आयुष्यात सुट्टीचंसुद्धा एक रुटीन होतं. तेच ते अन तेच ते. आराम करायचा असं ठरवलं तरी काही वेळातच त्याचाही कंटाळा येतो. आजही तेच झालेलं, कामात असताना वेळ पुरत नाही पण आज मात्र वेळ जाता जात नव्हता. खूप कंटाळा आलेला. कशातच लक्ष लागत नव्हतं. विचित्र अशी बेचैनी. कडक उन्हामुळं बाहेर जायची अजिबात इच्छा नव्हती. इतक्यात मित्राचा फोन “काय करतोयेस”

“विशेष काही नाही”

“गुड!! , भेटीचा प्लान ठरलाय. अर्ध्या तासात ये. कुठलंही कारण नको. कळलं”

“एकदम अचानक, ”

“तू ये रे ”

“ऐक ना”मी टाळण्याचा प्रयत्न केला तेव्हा जिवलग मित्रांच्या ‘खास प्रेमाच्या भाषेत’ मित्रानं सुरवात केली अर्थात मीही तसाच प्रतिसाद दिला. आयुष्यात काही खास माणसं असतात ज्यांच्यासोबत सगळे मुखवटे काढून मनमोकळं वागता येतं, वाट्टेल ते बोलता येतं. कुठंही ईगो आड येत नाही. आमची मैत्री अशीच होती.

माझी वेगवेगळी कारणं ऐकून मित्र भडकला. “ए गप ऐक. मला काही माहीत नाही. तू येतोयेस. बाय!! ”फोन कट.

थोड्याच वेळापूर्वी भाजीसाठी सोबत येण्याचा सौंनी आग्रह केला तेव्हा मी टाळलं आणि आता मित्राचा फोन. आवरून घराबाहेर पडताना सौंकडे पाहिलं काही प्रतिक्रिया नाही पण तिचा कटाक्ष बरंच काही सांगून गेला.

काही वेळातच चार दिशांना राहणारे आम्ही भेटलो. पद, प्रतिष्ठा, शिक्षण, मान, पैसा, श्रीमंती, जबाबदारी, वयानुसार आलेला पोक्तपणा सगळं सगळं बाजूला ठेवून चेष्टा, मस्करीत गुंग झालो. मस्त फिलिंग होतं.

“बरं झालं आलो. मजा आली. ”

“म्हणूनच आग्रह केला. जास्त नखरे करायला चान्सच दिला नाही. ”

“बिझी लाईफमुळं एकाच शहरात असूनदेखील भेटणं होत नाही. त्यापेक्षा असं अचानक भेटण्यातली मजा काही औरच. ”

“मुद्दाम वेळ काढून भेटणं, घरी जाणं यासारख्या गोष्टी आता दुर्मिळ झाल्यात. ”

“हो रे, आता न कळवता भेटायला गेलो तर आवडतं नाही. ”

“नात्यातली सहजता केव्हाच संपलीय आता फक्त औपचारीकपणा. ”

“फोन, मेसेजेस, चॅटिंग, व्हिडीओ कॉलमुळे कनेक्ट असला तरीही प्रत्यक्ष भेटीतला आनंद वेगळाच. ”

“भाऊ, म्हणूनच म्हणतो अधून मधून तोंड दाखवत जा. बरं वाटतं”गप्पांच्या नादात दोन तास कसे गेले कळलचं नाही. मूड एकदम ताजातवाना झाला.

“थॅंक्स यार, भारी वाटलं. आता पुन्हा पुन्हा भेटू. ” निरोप घेताना प्रत्येकाच्या मनात हीच भावना होती. गाणं गुणगुणत घरात आलो तेव्हा सौं सूचक हसली. “अरे वा, मूड चांगला दिसतोय”

“येस्स.. ”

“जेवणार आहात की मित्रांना भेटून पोट भरलयं. ”सौंचा चिमटा.

“मन तृप्त झालंय. आता पोटपूजा”

कामं, जबाबदाऱ्या तर कायम असणार तरीही वेळ काढून आपल्या माणसांना भेटत रहा. छान वाटतं.

 

© श्री मंगेश मधुकर

मो. 98228 50034

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “२१ जून : खगोलीय आणि भूगोलीय महत्त्व” ☆ श्री जगदीश काबरे ☆

श्री जगदीश काबरे

? इंद्रधनुष्य ?

☆ “२१ जून : खगोलीय आणि भूगोलीय महत्त्व☆ श्री जगदीश काबरे ☆

२१ जून चे महत्व विशद करणारे ए आय निर्मित छायाचित्र…

२१ जून हा दिवस पृथ्वीच्या परिभ्रमण कालातील अत्यंत महत्त्वाचा टप्पा मानला जातो. या दिवशी उत्तर गोलार्धात वर्षातील सर्वांत मोठा दिवस आणि दक्षिण गोलार्धात सर्वांत लहान रात्र अनुभवास येते. यालाच ग्रीष्म अयनांत (Summer Solstice) म्हणतात. हा दिवस केवळ खगोलशास्त्रीय दृष्टीनेच नव्हे तर भूगोल, हवामानशास्त्र, शेती आणि मानवी संस्कृतीच्या दृष्टीनेही अत्यंत महत्त्वाचा आहे. मी सांगलीत राहत असल्यामुळे या दिवसाची माहिती खालील प्रमाणे आहे. सांगलीचे अक्षांश सुमारे १६.८५° उत्तर असल्यामुळे २१ जून रोजी सूर्योदय साधारण सकाळी ५:५८ ते ६:०० दरम्यान झाला आणि सूर्यास्त सायंकाळी ७:०५ ते ७:०७ दरम्यान होणार आहे. म्हणजे आज २१ जूनला सांगलीत दिवसाची लांबी साधारण १३ तास ७ ते १० मिनिटे इतकी आहे.

पृथ्वी सूर्याभोवती परिभ्रमण करत असताना तिचा अक्ष सुमारे २३.५ अंशांनी कललेला असल्यामुळे २१ जून रोजी उत्तर ध्रुव सूर्याच्या लंबरेषेत असतो. त्यामुळे सूर्याची किरणे थेट कर्कवृत्तावर (२३.५ अंश उत्तर अक्षवृत्त) लंब रेषेत पडतात. या दिवशी दुपारी सूर्य कर्कवृत्तावर आकाशात सर्वाधिक उंचीवर दिसतो. याच कारणामुळे उत्तर गोलार्धात सूर्यप्रकाशाचा कालावधी सर्वाधिक असतो. त्याउलट दक्षिण गोलार्धात हा दिवस सर्वांत लहान आणि रात्र सर्वांत मोठी असते. तेथे हा हिवाळी अयनांत (Winter Solstice) असतो. तसेच २१ जून हा दिवस पृथ्वीवरील उष्णतेच्या वितरणासाठी महत्त्वाचा आहे. कर्कवृत्तावर सूर्यकिरणे लंब रेषेत पडल्यामुळे उत्तर गोलार्धातील भूमी अधिक तापू लागते. जमीन समुद्रापेक्षा लवकर तापत असल्याने आशियाई खंडावर कमी दाबाचा पट्टा अधिक तीव्र होतो. याच प्रक्रियेमुळे भारतीय मान्सूनला बळ मिळते. त्यामुळे अप्रत्यक्षपणे २१ जूनचा संबंध भारतातील पावसाळ्याशीही जोडला जातो.

या दिवशी ध्रुवीय प्रदेशांमध्ये विलक्षण घटना घडतात. उत्तर ध्रुवाजवळील भागात सूर्य २४ तास मावळत नाही. याला मध्यरात्रीचा सूर्य (Midnight Sun) म्हणतात. तर दक्षिण ध्रुवीय प्रदेशात २४ तास अंधार असतो. मानवी संस्कृतीच्या इतिहासातही २१ जूनला विशेष स्थान आहे. प्राचीन काळातील अनेक संस्कृतींनी अयनांतांचे निरीक्षण करून कालगणना विकसित केली. अनेक प्राचीन वेधशाळा, मंदिरे आणि स्मारके सूर्याच्या या स्थितीशी सुसंगत रचली गेली होती. कारण शेती, ऋतू आणि मानवी जीवन यांचा संबंध सूर्याच्या गतीशी अतूट होता.

भारतीय संदर्भात २१ जूनला आणखी एक विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. २०१४ मध्ये भारताच्या पुढाकाराने संयुक्त राष्ट्रांनी २१ जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून घोषित केला. वर्षातील सर्वांत मोठा दिवस असल्याने आणि भारतीय परंपरेत सूर्य व ऋतूचक्राला असलेल्या महत्त्वामुळे ही तारीख निवडण्यात आली. मात्र एक मनोरंजक बाब लक्षात आली, ती म्हणजे २१ जून हा दिवस सर्वाधिक सूर्यप्रकाशाचा असला तरी तो सर्वाधिक उष्णतेचा दिवस असेलच असे नाही. पृथ्वीची जमीन आणि महासागर उष्णता साठवून ठेवतात. त्यामुळे अनेक भागांत जूनच्या उत्तरार्धात किंवा जुलैमध्ये तापमानाची कमाल नोंदली जाते. याला ऋतूगत विलंब (Seasonal Lag) असे म्हणतात. हा दिवस आपल्याला स्मरण करून देतो की पृथ्वीवरील जीवन, हवामान आणि ऋतू यांचे मूळ आपल्या ग्रहाच्या अवकाशातील स्थान आणि गतीमध्ये दडलेले आहे.✍️

© श्री जगदीश काबरे

(लेखक विज्ञान आणि वैज्ञानिक दृष्टीकोन प्रसारक आहेत.)

jetjagdish@gmail. com

मो ९९२०१९७६८०

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ मनाचे श्लोक – एक सार्वकालिक ‘मनोपनिषद’… – श्लोक श्लोक ६१ आणि ६२ ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्री विश्वास देशपांडे

? इंद्रधनुष्य ?

☆ मनाचे श्लोक – एक सार्वकालिक ‘मनोपनिषद’… – श्लोक ६१ आणि ६२ ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्लोक क्र. ६१ – – – 

उभा कल्प वृक्षातळी दुःख वाहे |

तया अंतरी सर्वदा ते चि आहे |

जनी सज्जनी वाद हा वाढवावा |

पुढे मागुता शोक जीवी धरावा |६१|

अर्थ : एखादा माणूस कल्पवृक्षाच्या खाली उभा आहे परंतु त्याच्या मनात जर दुःखाची किंवा दुःख देणाऱ्या इच्छांचीच कामना असेल तर त्याला आयुष्यभर दुःखच भोगावे लागेल. त्याचप्रमाणे एखादी व्यक्ती संतांकडे गेली आणि त्यांच्याशी निरर्थक वाद घालू लागली तर त्यालाही आयुष्यभर दुःखालाच सामोरे जावे लागेल.

(वाहे- सुरू राहील, सज्जन- साधू पुरुष, वाद- निरर्थक चर्चा)

विवेचन : आधीच्या श्लोकात श्रीराम किंवा भगवंत म्हणजे कल्पतरू आहे असे समर्थांनी सांगितले. परंतु असा कल्पतरू किंवा कल्पवृक्ष आपल्याजवळ असताना त्याच्या छायेत उभे राहून दुःखाची किंवा दुःख देणाऱ्या गोष्टींची कामना करीत राहिलो तर आपल्या वाट्याला दुःख येईल आणि आयुष्यभर ते दुःखच सुरू राहील. काही माणसांचा स्वभावाच असा असतो की ते आपल्या विचारांनी स्वतःलाच दुःखी करून घेतात. चेहऱ्यावर कायमच बारा वाजलेले असतात. माझ्याच वाट्याला हे दुःख का? मी फार कमनशिबी आहे. मला कुठलीही गोष्ट सहजपणे मिळत नाही. अशा प्रकारचे निराशेचे विचार त्यांच्या मनामध्ये कायम घोळत असतात. आणि परिणामी दुःखच त्यांच्या वाट्याला येते. अशा लोकांबद्दल बोलताना समर्थ म्हणतात की असे लोक कल्पवृक्षाच्या खाली बसूनही दुःखच करीत राहतात त्यांच्या इतके अभागी कोणीच नाही.

खरे संत किंवा साधू पुरुष मुळातच भेटणे दुर्मिळ असते. ते आपल्यासाठी मोक्षमार्गाचे दिशादर्शक असतात. त्या मार्गावर कशी वाटचाल करावी याचे मार्गदर्शन ते करतात. त्यांच्या मनात सदैव आपल्या कल्याणाचीच इच्छा असते. म्हणूनच संतांबद्दल बोलताना तुकाराम महाराजांनी, ” संतांचिया गावी प्रेमाचा सुकाळू” असे म्हटलेआहे. पण काही व्यक्ती संतांजवळ आपले कल्याण करून घेण्याच्या हेतूने जात नाहीत. त्यांना नको ते प्रश्न विचारून किंवा त्यांच्याशी निरर्थक वाद घालून आपली विद्वत्ता ते दाखवण्याचा प्रयत्न करीत असतात. खरंच देव आहे का? तुम्ही पाहिला आहे का? देव आहे हे कशावरून? हे सगळे परमेश्वराच्याच मर्जीने घडते याचा काय पुरावा आहे? यासारखे निरर्थक प्रश्न असे लोक विचारत राहतात आणि निरर्थक व्यर्थ वाद घालत राहतात.

परमेश्वराच्या भक्तीचे महत्व, परमेश्वराची भक्ती कशी करावी, अनुसंधान कसे टिकवून ठेवावे या सर्व गोष्टी त्यांच्याकडून समजून घेण्याऐवजी त्यांच्याशी जर आपण अशा निरर्थक गोष्टींवर वाद घालत राहिलो तर आपल्या वाट्याला आयुष्यभर दुःखच येणार हे निश्चित! आणि वेळ निघून गेल्यानंतर आपली चूक कळली तरी काही उपयोग नसतो.

परमेश्वर सर्वव्यापी आहे. या अर्थाने आपण २४ तास कल्पवृक्षाच्या खाली उभे असतो. कल्पवृक्ष म्हणजे मागितलेले सगळे काही देणारा. या कल्पवृक्षाच्या खाली उभे राहून आपण ज्या काही इच्छा व्यक्त करू, त्यांना ‘तथास्तु’ म्हणून तो आशीर्वाद देत असतो. म्हणून नेहमी विधायक बोलणे, चांगल्या इच्छा ठेवणे आणि चांगले गोष्टींची कामना करणे हे आपल्या मनामध्ये असले पाहिजे. म्हणजे या चांगल्या गोष्टींसाठी त्या कल्पवृक्षाचा आशीर्वाद लाभेल. तो तथास्तु म्हणेल आणि त्या गोष्टी आपल्याकडे परत येतील. परंतु आपण जर दुःख देणाऱ्या गोष्टींची किंवा वाईट गोष्टींची अपेक्षा ठेवली तर त्याच गोष्टी आपल्याकडे परत येणार आहेत हे आपण लक्षात ठेवले पाहिजे. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर यालाच आपण लॉ ऑफ अट्रॅक्शन असे म्हणतो.

या ठिकाणी आपला असाही गैरसमज होण्याची शक्यता आहे की वाईट इच्छा आपण कशाला व्यक्त करू? परंतु आपण कामना करतो ते दुःख देणार्‍या गोष्टींचीच. भौतिक सुखे, ऐहिक गोष्टी आपल्याला हव्या असतात. पण त्या अंतिमतः दुःखच देतात. श्रेयस मागण्याऐवजी आपण प्रेयसाचीच कामना करतो. म्हणून आपल्या विचाराने आपणच आपले भविष्य घडवत असतो. आपणच आपल्या भविष्याचे शिल्पकार असतो.

समजा प्रत्यक्ष परमेश्वर भेटला किंवा अचानक कल्पवृक्षाच्या खाली बसण्याचे भाग्य लागले तर अशावेळी काय मागावे हे सुद्धा आपल्याला कळले पाहिजे. एका भिकारी माणसाने एक लॉटरीचे तिकीट विकत घेतले आणि अशी इच्छा करत बसला की मला जर ही लॉटरी लागली तर मी खूप श्रीमंत होईल आणि गाडीत बसून भीक मागेन. तेव्हा काय मागायचे किंवा इच्छा सुद्धा काय करायची याचेही ज्ञान हवे. त्यासाठी साधनेची आवश्यकता असते. मनामध्ये लोककल्याणाची भावना हवी. साधुसंत भेटल्यानंतर त्यांच्याकडून आत्मोद्धार कसा करून घेता येईल याबद्दल विचार करता यायला हवा. आणि या सगळ्या गोष्टींसाठी आपल्या इंद्रियांना वळण लावायला हवे. त्यासाठी वैराग्य आणि विवेक या दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत. अन्यथा नंतर केवळ पश्चातापच हाती उरतो.

म्हणूनच समर्थ या श्लोकातून आपल्याला बजावतात की कल्पवृक्षाची सावली सदैव आपल्यावर आहे, परंतु त्या सावलीचा लाभ घेण्यासाठी आपले मन शुद्ध, विवेकी आणि श्रेयसाभिमुख असणे अत्यावश्यक आहे. संतांची संगती हे त्याचेच साधन. आणि ते साधन वाया घालवणे म्हणजे स्वतःच स्वतःला दुःखाच्या गर्तेत लोटणे होय.

स्वसंवाद :: 

१. माझ्या आयुष्यात कल्पवृक्ष म्हणजे परमेश्वर सदैव सोबत आहे, हे मला खरोखर मनापासून वाटते का?

२. मी रोज जे विचार करतो, जे शब्द उच्चारतो, ते विधायक असतात की निराशेचे? माझ्या मनाचा कल कोणत्या दिशेने जास्त आहे?

३. एखाद्या संत, ज्येष्ठ व्यक्ती किंवा गुरूंशी बोलताना मी खरोखर काही शिकण्यासाठी जातो की माझी विद्वत्ता दाखवण्यासाठी?

४. “श्रेयस” आणि “प्रेयस” यांतला फरक मला कळतो पण मी प्रत्यक्ष आयुष्यात श्रेयसाची निवड किती वेळा करतो?

५. माझ्या जीवनातील एखाद्या दुःखाचे मूळ माझ्याच विचारांत किंवा चुकीच्या इच्छांमध्ये होते असे आता वाटते का? (क्रमशः)

– – – – 

श्लोक क्र. ६२ – – – 

निजध्यास तो सर्व तूटोनि गेला |

बळे अंतरे शोक संताप ठेला |

सुखानंद आनंद भेदे बुडाला |

मनी निश्चयो सर्व खेदे बुडाला |६२|

अर्थ :  भगवंताच्या भक्तीचा किंवा स्वस्वरूपाचा ध्यास एकदा तुटला की मनामध्ये शोक, संताप बळजबरीने ठाण मांडतात. सुख आणि आनंद नष्ट होतो आणि परमेश्वराच्या प्राप्तीचा मनामध्ये केलेला निश्चय देखील नष्ट होतो.

(निजध्यास – स्व स्वरूपाचे अनुसंधान, तूटोनी गेला – खंड पडला)

विवेचन : परमेश्वराची प्राप्ती करून घ्यायची असेल तर त्यामध्ये सातत्य आवश्यक असते. त्याचा ध्यास किंवा वेड मनाला लागणे आवश्यक असते. सततचे अनुसंधान किंवा स्व स्वरूपाचे चिंतन परमेश्वर प्राप्तीसाठी आवश्यक असते. परंतु आपले मन जेव्हा वादात अडकते तेव्हा हे अनुसंधान तुटते. मनामध्ये निरनिराळ्या प्रकारच्या शंका येऊ लागतात. मनाला काहीतरी काम देणे आवश्यक असते. रिकामे मन म्हणजे सैतानाचे घर असे आपण म्हणतो. जेव्हा परमेश्वराचे अनुसंधान तुटते तेव्हा या रिकाम्या मनामध्ये नको ते विचार गर्दी करू लागतात.

मनाचा मूळ स्वभाव शांततेचा आहे. जेव्हा सातत्याने परमेश्वराचे अनुसंधान, नामस्मरण, भजन, कीर्तन या गोष्टी सुरू असतात, तेव्हा मनामध्ये शांतता, सुख, समाधान आणि आनंद या गोष्टी नांदत असतात. परंतु ही शांतता, समाधान आणि आनंद मग भंग पावतात. शोक आणि संताप बळजबरीने मनाचा ताबा घेतात आणि मग आपण स्वतःला दुःखी करून घेत असतो.

अशी अवस्था जेव्हा आपल्या मनाची द्विधा स्थिती असते तेव्हा होते. संतांनी सांगितलेला उपदेश ऐकल्यानंतर किंवा कीर्तन, प्रवचन ऐकल्यानंतर आपण परमेश्वराची उपासना करावी अशी तीव्रतेने इच्छा होते. परंतु काही काळ गेल्यानंतर संतांच्या उपदेशाचा प्रभाव ओसरतो. परमेश्वरावर असलेली श्रद्धा डळमळीत होऊ लागते मग असे वाटते की परमेश्वर भेटेल की नाही माहिती नाही परंतु आज जो आनंद आपल्या हातात आहे तो उपभोगावा. जो निजध्यास घेतलेला असतो तो आपण सोडतो. तेवढे धैर्य किंवा तेवढी वाट पाहण्याची तयारी आपली राहत नाही. परिणामी चित्तात शोक आणि संताप घर करतात.

श्रद्धावान लभते ज्ञानम! श्रद्धावंतालाच ज्ञान प्राप्त होते. अर्थात हे ज्ञान म्हणजे परमेश्वर प्राप्तीचे ज्ञान किंवा स्व स्वरूपाचे ज्ञान. परंतु त्यासाठी संयम, विवेक आणि वैराग्य या गुणांची आवश्यकता असते. सामान्य माणसाजवळ एवढा धीर नसतो. म्हणून त्याने जी काही दोन चार पावले परमेश्वर प्राप्तीच्या मार्गावर टाकलेली असतात, तिथून तो मागे येतो. सद्गुरूंनी मला अमुक इतका जप करायला सांगितला होता. तेवढ्या संख्येमध्ये मी तो केला परंतु मला कोणताही अनुभव आला नाही किंवा परमेश्वराची प्राप्ती झाली नाही. असा विचार करून सामान्य माणूस अध्यात्ममार्गापासून ढळतो. पण ज्याची श्रद्धा अविचल असते, तो कितीही संकटे आली किंवा कितीही तपश्चर्या करावी लागली तरी त्यापासून ढळत नाही. जर त्याला कोणी सांगितले की तू एवढा जप केलास परंतु तेवढा पुरेसा नाही. तुला आणखी इतकाच जप करावा लागेल किंवा आणखी अमुक इतकी वर्षे तपश्चर्या करावी लागेल तर तो त्यासाठी आनंदाने तयार होतो. कारण त्याला माहिती असते की त्यानंतर परमेश्वर आपल्याला निश्चितपणे भेटेल. आणि अशा रीतीने ज्यांची श्रद्धा अविचल असते अशा लोकांना परमेश्वराची प्राप्ती झाल्याशिवाय राहत नाही.

म्हणून आपण संतसंगतीचा लाभ घ्यावा. त्यांच्याकडून परमेश्वर प्राप्तीचे रहस्य जाणून घेण्याचा प्रयत्न करावा. आणि त्यांच्याशी निरर्थक वाद न घालता त्यांच्या सांगण्याप्रमाणे वाटचाल करावी. वेळीच सावध होणे गरजेचे आहे हेच समर्थ या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितात. तेव्हा निजध्यास सोडू नका. संत सोहिरोबा म्हणतात, ” हरी भजनावीण काळ घालवू नको रे. “

स्वसंवाद :: 

१. निजध्यास केव्हा आणि का तुटतो?

२. कीर्तन-प्रवचनानंतर वाटणारी तीव्र भक्तिभावना काही दिवसांत का ओसरते? यावर उपाय काय?

३. “श्रद्धावान लभते ज्ञानम्” या वचनावर तुमचं दृढ विश्वास आहे का?

४. सद्गुरूंनी सांगितलेला जप केला पण अनुभव आला नाही. अशा वेळी मनात कोणते विचार येतात? तुम्ही त्याला कसे सामोरे जाता?

५. संत सोहिरोबांची ओळ “हरी भजनावीण काळ घालवू नको रे” हे मला माझ्या व्यस्त आयुष्यात कसे साधता येईल?

– क्रमशः श्लोक श्लोक ६१ आणि ६२.

© श्री विश्वास देशपांडे

चाळीसगाव

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “सलाम या महान सैनिकाला!!!” – इंग्रजी लेखक : अज्ञात ☆ मराठी अनुवाद व प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर ☆

श्री मोहन निमोणकर 

? इंद्रधनुष्य ?

☆ “सलाम या महान सैनिकाला!!!” – इंग्रजी लेखक : अज्ञात ☆ मराठी अनुवाद व प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर

१९७१ चे युद्ध संपल्यानंतरची ही गोष्ट आहे. युद्ध संपताच जन. माणेकशॉ यांची निवृत्ती जवळ येऊ लागली होती. एक दिवस त्यांच्या असे लक्षात आले की त्यांचा ड्रायव्हर श्याम सिंग अचानकपणे कुठल्यातरी तणावाखाली आलेला दिसत होता आणि खूप चिंताग्रस्तही वाटत होता. तो काही नेहमीसारखा दिसत नव्हता. त्याच्या चेहऱ्यावरच्या काळजीकडे दुर्लक्ष करताच येणार नाही इतकी ती अगदी स्पष्ट जाणवत होती. आणि अर्थातच ही गोष्ट जन. माणेकशॉ यांच्या लक्षात आलीच.

 ” नेमकं काय झालंय श्यामसिंग? आजकाल तू इतका चिंताग्रस्त वाटतोयस की जणू काही तुझ्या घरच्या म्हशीने दूध देणे बंद केले आहे. काय झालंय “

” नाही सर, तसं काहीच झालेलं नाही ” एवढंच बोलून श्यामसिंग गप्प बसला.

 पुढचे काही दिवस असेच गेले. पण जन. माणेकशांची निवृत्तीची तारीख जशी जवळ आली तशी श्यामसिंगने शेवटी त्यांना मनातली गोष्ट बोलून दाखवली …….

” सर, माझी एक इच्छा आहे जी फक्त आपणच पूर्ण करू शकता… “

” अरे मग सांग ना मला.. नि:संकोचपणे बोल”.

” सर, मलाही नोकरीतून लवकर निवृत्त व्हायचंय. कृपया यासाठी आपण शिफारस करावी अशी मी आपल्याला विनंती करतो… “

“अरे पण कशासाठी इतक्या लवकर निवृत्त व्हायचंय तुला? काही जमिनीचा वाद, भांडणतंटा आहे, का काही कौटुंबिक वाद? तू तुझी नोकरी व्यवस्थित पूर्ण कर. मी तुला नायब सुभेदार होण्यासाठी मदत करीन. पण तू ही लष्करातली नोकरी सोडू नकोस! ” जन. माणेकशॉ यांनी त्याला सल्ला दिला.

….. ” नाही सर, काही वेगळंच कारण आहे याचं. पण नोकरी सोडेपर्यंत मी तुम्हाला ते सांगू शकत नाही. “

त्याचा प्रामाणिकपणा आणि स्वाभिमान पाहून अखेर जनरलने त्याच्या निवृत्तीची आवश्यक ती औपचारिकता पूर्ण केली आणि काही दिवसातच त्याच्या निवृत्तीची ऑर्डर आली.

जनरलने आता पुन्हा एकदा त्याला विचारले ” आता तुला बरं वाटलं ना? आता तरी सांगशील का मला की तुला लवकर का निवृत्त व्हायचे होते? ” 

ड्रायव्हर आदबीने उभा राहिला आणि म्हणाला, ” सर, आपला ड्राइवर म्हणून इतकी वर्षं काम केल्यानंतर आता मी दुसऱ्या कुणाचा तरी ड्राइवर म्हणून काम करूच शकणार नाही. आपल्या गाडीचा ड्रायव्हर म्हणून काम करणं हा माझ्यासाठी माझ्या जीवनातला सर्वात मोठा सन्मान होता आणि आता इथून पुढे तोच सन्मान आणि ती आठवण आयुष्यभरासाठी सोबत घेऊन मला जगायचं आहे. “.

हे उत्तर ऐकून फील्ड मार्शल माणेकशॉ यांना हसू आलं आणि ते म्हणाले, ” तू खरंच महामूर्ख आहेस! तुम्ही हरियाणवी लोक ना अगदी हट्टी आणि करारी असता. पण आता निवृत्तीबाबतची कार्यवाही सुरु झाल्याने त्यात कुठलाच बदल करणं मला शक्य नाही. ” 

मग एक दिवस जनरलने त्याला विचारलेच, ” निवृत्तीनंतर तू काय करायचे ठरविले आहेस? “

” काही तरी करीन सर, एखादी नोकरी शोधेन. “

“तुझ्याकडे शेती किती आहे? “

” शेती नाहीच आहे सर. मी एका गरीब कुटुंबातला आहे.. ” 

.. यावर जनरल माणेकशॉ यांचं मन हेलावलं.. ‘एका अशा अधिकाऱ्याचा ड्रायव्हर म्हणून नोकरी केल्यावर दुसऱ्या कुणाकडेच आपण ड्रायव्हर म्हणून काम करू शकणार नाही’, या विचाराने आपल्या उपजीविकेचे साधनच वाऱ्यावर सोडून देणारा असा हा गरजू माणूस बघून कमांडर साहेबांना खूप वाईट वाटले.

श्यामसिंगच्या निरोप समारंभाच्या दिवशी कमांडर माणिकशॉनी त्याच्या हातात एक पाकिट दिले आणि सांगितले.. ” श्यामसिंग, हे पाकिट घरी गेल्यावरच उघडायचं बरं का “.

” होय, सर ” असं म्हणत श्यामसिंगने त्यांना एक सॅल्युट केला आणि निघून गेला.

घरी आल्यावर लगेच तो नोकरी शोधण्यात गर्क झाला आणि ते पाकिट पूर्णपणे विसरून गेला. एके दिवशी त्याची बायको त्याला म्हणाली, ” मी तुमचा आर्मीचा गणवेश ट्रंकमधे ठेवत असतांना त्याच्या खिशात मला हे पाकिट सापडले आहे ” 

” अरे बापरे, मी पूर्णपणे विसरूनच गेलो बघ. मला वाचता येत नसल्याने मी ते उघडलेच नाही. नक्कीच त्यात सरांनी मला दिलेले प्रशस्तीपत्रक असेल. कारण वरिष्ठ अधिकारी अशी प्रशस्तीपत्रके देतच असतात. ” “ पण तरी आपण हे मास्तरांकडे घेऊन जाऊ आणि त्यांनाच ते वाचायला सांगू. मला खूप उत्सुकता लागून राहिली आहे त्यात काय लिहिले आहे ते जाणून घेण्याची ” बायको म्हणाली.

म्हणून मग ते दोघे शाळेच्या मुख्याध्यापकाकडे गेले आणि त्यांना ते पत्र मोठ्याने वाचण्याची विनंती केली. मुख्याध्यापकांनी चष्मा घातला, पाकिट उघडले.. वाचले, आणि ते अचानक एकदम स्तब्धच झाले.

“काय झाले गुरुजी? तुम्ही हे पत्र असं निरखून का बघताय? ” काही न कळून श्यामसिंगने विचारलं.

” अरे तुला काही कल्पना तरी आहे का यात काय लिहिलंय याची? “

” नाही गुरूजी! “

“अरे, यात एक हस्तांतर दस्त आहे. “

“ म्हणजे नक्की काय आहे? “ गोंधळून गेलेल्या श्यामसिंगने विचारलं.

” अरे १९७१च्या युद्धातील विजयानंतर हरियाणा सरकारने जनरल सॅम माणेकशॉ यांना त्यांचा बहुमान म्हणून 25 एकर जमीन बक्षीस दिली होती. आणि आता ती पूर्ण जमीन त्यांनी तुझ्या नावावर ट्रान्सफर केलीय. आता तू चक्क 25 एकर जमिनीचा मालक झाला आहेस श्यामलाल “.

– – खऱ्या अर्थाने महान असलेल्या जन. माणेकशॉ यांनी एका ड्रायव्हरला दिलेल्या ‘ऐतिहासिक’ बक्षीसाची ही कहाणी आहे. युद्धातील विजयामुळे स्वतःला बक्षीस म्हणून मिळालेली सोनीपत येथील जमीन तर त्यांनी अगदी सहजपणे आपल्या ड्रायव्हरला दान केलीच, शिवाय या दानशूर नेत्याने फिल्ड मार्शल म्हणून स्वतःला मिळणारे पेन्शनही सैन्यातील जवानांच्या विधवांच्या कल्याण निधीला देणगी म्हणून देऊन टाकले..

अतिशय दिलदार स्वभावाच्या या महान सैनिकाला आणि माणूस म्हणून त्यांच्यात असलेल्या विलक्षण आणि असामान्य माणुसकीला अगदी मनापासून सलाम!!!

जय हिंद!!!!!.

 

इंग्रजी माहिती संकलक आणि लेखक : अज्ञात.

मराठी अनुवाद आणि प्रस्तुती : मोहन निमोणकर 

संपर्क – सिंहगडरोड, पुणे-५१ मो.  ८४४६३९५७१३.

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ निमित्त… कवयित्री : अनामिका ☆ प्रस्तुती : उषा नाईक ☆

उषा नाईक

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ निमित्तकवयित्री : अनामिका ☆ प्रस्तुती : उषा नाईक ☆

 स्वयंपाकघरात शिरायला

आताशा नको वाटतं

खावंसं वाटतं पण

करायला नको वाटतं

पूर्वी करून दाखविण्याची

महाभयंकर हौस होती

स्वतःला सिद्ध करण्याची 

चांगलीच खुमखुमी होती

 *

थोडी इतरांनाही  संधी द्यावी

आता असं वाटत राहतं

स्वयंपाकघरात शिरायला

आताशा नको वाटतं

 *

चविष्ट काही केलं की

वजनाकडे लक्ष जातं

पौष्टिक करायचं म्हटलं की

तोंडाचं पाणी पळतं

 *

जीभ आणि पोटाचं

भांडण कधी थांबत नसतं

स्वयंपाकघरात शिरायला

आताशा नको वाटतं

 *

सकाळ संध्याकाळ काय करावं

प्रश्नचिन्ह सतावत असतं

चहा आयता मिळाला की

मनापासून बरं वाटतं

 *

कमी खावं म्हटलं तर

भुकेनी डोकं दुखतं

स्वयंपाकघरात शिरायला

आताशा नको वाटतं

 *

सगळे चेष्टा करू लागले

वय झालं’ म्हणू लागले

ती कुजबुज कानी पडता

मनोमनी भांबावले

 *

खरंच काय कारण असावं

अंतरंग शोधू लागतं

स्वयंपाकघरात शिरायला

का बरं नको वाटतं ?

 *

परमेश्वरी इच्छा असेल

संसारातून  बाहेर पडावं

हळूहळू निवृत्त होत 

वैराग्याकडे वळावं

 *

स्वयंपाकघराच्या निमित्ताने

मन सूचना देत असतं

स्वयंपाकघरात शिरायला

टाळाटाळ करत असतं

कवयित्री : अनामिका

प्रस्तुती :  उषा नाईक

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ अशीही प्रचिती… ☆ नीलांबरी शिर्के ☆

नीलांबरी शिर्के

?️?  चित्रकाव्य  ?️?

☆ अशीही प्रचिती नीलांबरी शिर्के 

इवल्या इवल्या पोरांनाही 

कळू लागलंय आता

फूल तिचा माईक झाला

स्टॅन्डसह पुढे येता!!

*

टक टक करून खात्री

करून घेतेय ध्वनीची

आजू बाजूचेच शिकती पोरं 

प्रचिती येते इथे त्याची!!

©  सुश्री नीलांबरी शिर्के

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /मंजुषा मुळे/गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – कथा कहानी ☆ लघुकथा – “आज का रांझा” ☆ श्री कमलेश भारतीय ☆

श्री कमलेश भारतीय 

(जन्म – 17 जनवरी, 1952 ( होशियारपुर, पंजाब)  शिक्षा-  एम ए हिंदी , बी एड , प्रभाकर (स्वर्ण पदक)। प्रकाशन – अब तक ग्यारह पुस्तकें प्रकाशित । कथा संग्रह – 6 और लघुकथा संग्रह- 4 । यादों की धरोहर हिंदी के विशिष्ट रचनाकारों के इंटरव्यूज का संकलन। कथा संग्रह -एक संवाददाता की डायरी को प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी से मिला पुरस्कार । हरियाणा साहित्य अकादमी से श्रेष्ठ पत्रकारिता पुरस्कार। पंजाब भाषा विभाग से  कथा संग्रह-महक से ऊपर को वर्ष की सर्वोत्तम कथा कृति का पुरस्कार । हरियाणा ग्रंथ अकादमी के तीन वर्ष तक उपाध्यक्ष । दैनिक ट्रिब्यून से प्रिंसिपल रिपोर्टर के रूप में सेवानिवृत। सम्प्रति- स्वतंत्र लेखन व पत्रकारिता)

☆ लघुकथा – “आज का रांझा” ☆ श्री कमलेश भारतीय ☆

उन दोनों ने एक दूसरे को देख लिया था और मुस्कुरा दिए थे। करीब आते ही लड़की ने इशारा किया था और क्वार्टरों की ओर बढ़ चली। लड़का पीछे पीछे चलने लगा।

लड़के ने कहा -तुम्हारी आंखें झील सी गहरी हैं।

– हूं।

लड़की ने तेज तेज कदम रखते इतना ही कहा।

– तुम्हारे बाल काले बादल हैं।

– हूं।

लड़की तेज चलती गयी।

बाद में लड़का उसकी गर्दन , उंगलियों, गोलाइयों और कसाव की उपमाएं देता रहा। लड़की ने हूं भी नहीं की।

क्वार्टर खोलते ही लड़की ने पूछा -तुम्हारे लिए चाय बनाऊं?

चाय कह देना ही उसकी कमजोर नस पर हाथ रख देने के समान है , दूसरा वह बनाये। लड़के ने हां कह दी। लड़की चाय चली गयी औ, लड़का सपने बुनने लगा। दोनों नौकरी करते हैं। एक दूसरे को चाहते हैं। बस। ज़िंदगी कटेगी।

पर्दा हटा और ,,,,

लड़का सोफे में धंस गया। उसे लगा जैसे लड़की के हाथ में चाय का प्याला न होकर कोई रायफल हो , जिसकी नली उसकी तरफ हो। जो अभी गोली उगल देगी।

– चाय नहीं लोगे?

लड़का चुप बैठा रहा।

लड़की से, बोली -मेरा चेहरा देखते हो? स्टोव के ऊपर अचानक आने से झुलस गया। तुम्हें चाय तो पिलानी ही थी। सो दर्द पिये चुपचाप बना लाई।

लड़के ने कुछ नहीं कहा। उठा और दरवाजे तक पहुंच गया।

– चाय नहीं लोगे?

लड़की ने पूछा।

– फिर कब आओगे?

– अब नहीं आऊंगा।

– क्यों? मैं सुंदर नहीं रही?

और वह खिलखिला कर हंस दी।

लड़के ने पलट कर देखा,,,

लड़की के हाथ में एक सड़ा हुआ चेहरा था और वह पहले की तरह सुंदर थी।

लड़का मुस्कुरा कर करीब आने लगा तो उसने सड़ा हुआ चेहरा उसके मुंह पर फेंकते कहा -मुझे मुंह मत दिखाओ।

लड़के में हिम्मत नहीं थी कि उसकी अवज्ञा करता।

© श्री कमलेश भारतीय

पूर्व उपाध्यक्ष हरियाणा ग्रंथ अकादमी

संपर्क :   1034-बी, अर्बन एस्टेट-।।, हिसार-125005 (हरियाणा) मो. 94160-47075

संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – कविता – ☆ फूलों की सोच… ☆ सुश्री नरेंद्र कौर छाबड़ा ☆

सुश्री नरेंद्र कौर छाबड़ा

(सुप्रसिद्ध हिंदी साहित्यकार सुश्री नरेन्द्र कौर छाबड़ा जी पिछले 40 वर्षों से अधिक समय से लेखन में सक्रिय। 5 कहानी संग्रह, 1 लेख संग्रह, 2 लघुकथा संग्रह, 1 पंजाबी कथा संग्रह 1 तमिल में अनुवादित कथा संग्रह,मराठी में अनुवादित लघुकथा संग्रह, मराठी में अनुवादित  कहानी संग्रह, कुल 12 पुस्तकें प्रकाशित।  पहली पुस्तक मेरी प्रतिनिधि कहानियाँ को केंद्रीय निदेशालय का हिंदीतर भाषी पुरस्कार। एक और गांधारी तथा प्रतिबिंब कहानी संग्रह को महाराष्ट्र हिन्दी साहित्य अकादमी का मुंशी प्रेमचंद पुरस्कार 2008 तथा २०१७। प्रासंगिक प्रसंग पुस्तक को महाराष्ट्र अकादमी का काका कालेलकर पुरस्कार 2013 । लेखन में अनेकानेक पुरस्कार। आकाशवाणी से पिछले 45 वर्षों से रचनाओं का प्रसारण। लेखन के साथ चित्रकारी, समाजसेवा में भी सक्रिय । महाराष्ट्र बोर्ड की 10वीं कक्षा की हिन्दी लोकभारती पुस्तक में 2 लघुकथाएं शामिल 2018)

आज प्रस्तुत है आपकी एक विचारणीय कविता फूलों की सोच

? कविता – फूलों की सोच ? सुश्री नरेंद्र कौर छाबड़ा ?

मधुर महक से भरे

फूलों के गुच्छे

शीतल पवन से

हिलोरें लेते

मानो डालियों पर

झूला डाले

आनंद मगन हो रहे

 

डालियां उनके कानों में

सुरीली तान छेड़ती

हौले से पूछती हैं

कहां से लाते हो

यह भीनी मादक महक  ?

तुम्हारी जड़ों में तो माली

सड़ी गली गोबर

सूखे मरे पत्ते

कीड़ों की खाद

भरता रहता है

तुम पर उन सब का

कोई असर नहीं होता ?

 

फूल मुस्कुरा उठे

हम इंसान थोड़े ही हैं

जो सर्वश्रेष्ठ को लेकर

निकृष्ट बनाने में माहिर है

 

हमने तो सीखा है

सदा सुगंध ही सुगंध बिखेरना

मनुष्य बेशक

अपने स्वार्थ के चलते

हमारी अधखिली कलियों  को

कुचल मसल डालता है

पर हम भी अपनी

सुगंध बांटने से

पीछे नहीं हटेंगे

वह हमारे गुण चाहे

ना स्वीकारे 

हम उसके स्वार्थ

अवगुणों को

कभी नहीं अपनाएंगे

 

© नरेन्द्र कौर छाबड़ा

संपर्क –  सी-१२०३, वाटर्स एज, विशालनगर, पिंपले निलख, पुणे- ४११०२७ (महाराष्ट्र) मो.  9325261079 

Email-  narender.chhabda@gmail.com

संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ ≈

Please share your Post !

Shares