अरुणा मुल्हेरकर
विविधा
☆ मला समजलेली संत तुकारामांची अभंग गाथा… भाग – २५ ☆ अरुणा मुल्हेरकर ☆
नीती आणि धर्म
आत्तापर्यंतच्या चोवीस भागातून आपण संत तुकारामांच्या अनेक विषयांवरील अभंगांचा अभ्यास केला. या भागात त्यांनी माणसाच्या नीती आणि धर्माविषयी रचलेले काही अभंग आपण पाहू.
रडोनिया मान/ कोण मागता भूषण/
देवे दिले तरी गोड/ राही रुची आणि कोड//
लाविता लावणी/ विके भिके केज्या दानी//
तुका म्हणे धीरा/ विण कैसा होतो हिरा//
या अभंगात माणसाने खरेपणाने आणि धीराने वागावे असे महाराजांना लोकांना सांगायचे आहे. मला मान द्या असे रडगाणे लावून जर कोणी मान देत असेल तर त्यात काय मोठे भूषण आहे? लहान मुलाने रडावे आणि आपला हट्ट पुरा करावा तसाच हा प्रकार आहे. न मागता मिळतो तो खरा मान, मोठेपणा. म्हणून माणसाची वृत्ती समाधानी असावी. परमेश्वराने माझ्या पदरात जे दान टाकले आहे, ते गोड मानले आणि त्यात समाधान ठेवले तर ते खरे सुख आहे. उदाहरणादाखल महाराज पुढे सांगतात की, शेतात स्वतः राबून पिकवलेले धान्य दान केले तर त्यात खरे समाधान आहे. भीक मागून किंवा दुसऱ्याचे ओरबाडून घेतले आणि दानात दिले तर त्या दानाला काही अर्थ नाही. कोणत्याही प्रकारच्या उतावळेपणाने मोठेपणा मिळत नाही. जो धैर्यवंत असतो त्यालाच हिऱ्याची योग्यता लाभते.
पुढे ते सांगतात, ज्याला स्वहित साधायचे आहे त्याने नीती धर्माच्या खुणा, संकेत पाळणे अत्यंत जरुरीचे आहे.
पूज्या एकासनी आसनी आसन/
बैसता गमन मातेशी ते//
सांगतो ते धर्म नितीचा संकेत/
सावधान हित व्हावे तरी//
संता ठाया ठाव पूजनाची इच्छा/
जीवनीच वळसा सापडला//
तुका म्हणे एकाएकी वरासने/
दुजे तेथे भिन्न अशोभ ते//
प्रत्येकाने आपली मर्यादा ओळखून वागावे. ज्या आसनावर पूज्य अशा देवांची मूर्ती असेल किंवा गुरु बसलेले असतील, त्या आसनावर आपण बसू नये. ते पाप आहे. स्वतःची योग्यता नसताना, संतांप्रमाणे आपली ही पूजा व्हावी असे ज्याला वाटते, तो भवसागरात गटांगळ्या खातो आहे असे समजावे. श्रेष्ठ आसनावावर संत बसले असताना आपण तेथे जाऊन बसणे म्हणजे स्वतःची शोभा करून घेण्यासारखे आहे.
यासी कोणी म्हणे नींदेची उत्तरे/
नागवला खरे तोचि एक//
आडवाट जाता लावी नीट सोयी/
धर्मनिती तेही ऐसी आहे//
नाइका सुखे करावे ताडण/
पाप नाही पुण्य असे फार//
जन्मव्याधी फार चुकतील दुःखे/
खंडावा हा सुखे मान त्याचा//
तुका म्हणे निंब दिधल्यावाचून/
अंतरीचा शीण कसा जाय//
महाराजांना या अभंगात मुख्यतः काय सांगायचे आहे? तर ते म्हणजे दुर्जनाला शासन झालेच पाहिजे. कोणाला माझे हे भाषण निंदा वाटेल, पण ही निंदा नाही. कोणी आड मार्गाला जात असला तर त्याला सुयोग्य मार्गाला लावणे ही खरी धर्मनिती आहे. चांगल्या नीतीची गोष्ट सांगत असता जर कोणी ती ऐकली नाही तर त्याला खरपूस मार द्यावा. (शब्दांचा) त्यात पाप नसून ते पुण्यकर्मच ठरेल. असे केल्याने जन्मरूपी व्याधी आणि इतर अनेक दुःखातून त्याची सुटका होईल. म्हणून त्याची मानखंडना सुखाने करावी. अंग तापाने फणफणल्यावर त्याला कडुलिंबा सारखे कडू औषध द्यावे लागते ना? दुर्जनाला सुधारण्यासाठी शिक्षा करणे क्रमप्राप्त आहे.
एका विठ्ठलाच्या चरणाशी सर्व नीती, धर्म शास्त्र आहे. म्हणून तुकाराम महाराज सर्व लोकांना विठ्ठलापाशी भक्ती भाव ठेवण्यास सांगतात.
पृथक मी सांगो किती/ धर्म नीती सकळ/
अवघीयांचा एक ठाव/ शुद्ध भाव विठ्ठली//
क्षरा अक्षराचा भाग/ करा लाग पंढरीये/
तुका म्हणे आगामीचे/ मथिले साचे नवनीत//
महाराज म्हणतात की ते प्रत्येकाला धर्म आणि नीती विषयी वारंवार किती सांगणार? एकच करा, सर्वांनी विठ्ठलाच्या चरणी शुद्ध भाव ठेवावा. हेच धर्म आणि नीतीचे तात्पर्य आहे. तो क्षर ( सगुण) आणि अक्षररूप ( निर्गुण) पंढरपुरात आहे, त्या ठिकाणी सगळ्यांनी अवश्य जावे. सर्व शास्त्ररुपी दही घुसळून काढलेले लोणी म्हणजे प्रत्यक्ष विठ्ठल हे दैवत तेथे आहे. भगवंताचे ध्यान अंतःकरणांमध्ये करणे हीच त्याची पूजा आहे. या वाचून सर्व वेगवेगळ्या उपाधी पापमूलक आहेत. त्या उपाधींचा संकल्प सुद्धा करू नये. लोकहो, भगवंताने श्रुती आणि स्मृती मध्ये ज्या आज्ञा दिल्या आहेत, त्याप्रमाणे आचरण ठेवणे, हाच खरा धर्म आहे. हा धर्म पाळल्याने सहज स्थिती प्राप्त होईल, ज्या स्थितीचा तुम्हाला कधी वीट येणार नाही. मनाची स्थितप्रज्ञता ही सहज स्थिती आहे. त्यामुळे सुखाने अति आनंद होणार नाही किंवा दुःखाने अतीव दुःख होणार नाही.
नीतिमत्तेबद्दल तुकाराम महाराज आणखी काय सांगतात ते पाहूया.
नये पाहो मुख मात्रागमन्याचे/
तैसे अभक्त्याचे गुरुपुत्रा//
म्हणउनी बरे धरिता एकांत/
तेणे नवे घात भजनासी//
नये होऊ कदा निंदकाची भेटी/
जया द्वैतपोटी चांडाळाच्या//
*तुका म्हणे नको बोलो त्यासी गोष्टी/
जयाचिया दृष्टी पापवाढे/
त्यांचे म्हणणे असे आहे की, जो विकृत वृत्तीचा आहे, (मात्रागमन्या )- मातेशी गैर वृत्तिने वागणार्याचे तोंड कधी पाहू नये. गुरुची निंदा करणाऱ्या शिष्याचे, हरीची निंदा करणाऱ्याचे मुखही पाहू नये. आपल्या भक्तीत, भजन कीर्तनात कोणत्याही प्रकारचा व्यत्यय येऊ नये यासाठी एकांतात राहणे सर्वोत्तम! निंदकाची भेट घेणे टाळावे, कारण त्याच्या तोंडात गोडवा असला तरी पोटात कपट असते. अशा माणसांना नुसत्या पाहण्याने सुद्धा पाप वाढते. नीती धर्माच्या कल्पना जनसामान्यांच्या मनात रुजविण्यासाठी तुकाराम महाराज काही दृष्टांत देतात.
अग्निमाजी पडे धातू/ लीन होऊनी राहे आंतु/
होय शुद्ध न पावे धातू/ पटतंतूप्रमाणे//
बाह्य रंगाचे कारण/ मिथ्या अवघेची भूषण/
गर्व ताठा हे अज्ञान/ मरण सवे वाहतसे//
पुरे मातलिया नदी/ लव्हाळा नांदे जीवनसंधी*/
वृक्ष उन्मळोनी भेदी/ परी तो कधी भंगे ना//
हस्ती परदळ जो भंगी/ तया पायी न मरे मुंगी/
कोण जाय संगी/ पाणोवाणी तयाच्या//
पिटीता घणेवरी सैरा/ तया पोटी राहे हिरा/
तैशा काय तगती गारा/ तया थोरा होऊनी//
लीन दीन हेचि सार/ भव उतरावया पार/
पुढे माथा भार/ तुका म्हणे वाहोनी*//
माणसाने नेहमी दीन असावे. हा गुण किती चांगला आहे त्याची उदाहरणे महाराज देतात.
१) अग्नीमध्ये पडलेले सोने न जळता शुद्ध होते, परंतु वस्त्र किंवा धागा आगीत पडला तर त्याचा नाश होतो. बाह्यात्कारी भूषणे हा केवळ दिखावा असतो.
२) गर्व किंवा ताठा हे केवळ अज्ञान आहे. जीव गेला तरी अज्ञान तसेच राहते.
३) महापूर आला तर वृक्ष उन्मळून पडतात आणि लव्हाळी मात्र तशीच टिकून राहतात. * वृक्षवल्ली जाती तेथे लव्हाळे वाचती ज्ञानेश्वरांनी सुद्धा हेच सांगितले आहे.
४) हत्ती शत्रूचा विध्वंस करतो, परंतु त्याच्या पायाखाली मुंगी मरत नाही. म्हणून हत्तीच्या मागोमाग झुंज खेळायला कोण जाणार?
५) हिरा घणाने फुटत नाही, पण गारा हिर्या पेक्षा मोठ्या असल्या तरी त्या घणाखाली टिकतात का?
या सर्व उदाहरणांचा अर्थ एकच की, सर्वांनी दीन पणाने नम्र होऊन रहावे. मोठेपणाची ऐट कधी, कशाने गळून पडेल हे सांगता येत नाही. नम्रता, लीनता हे भवसागर पार करण्याचे फार मोठे साधन आहे. ज्याला मोठेपणाचा गर्व असेल
तो या भवसमुद्रात बुडून जाईल.
पुढील लेखात तुकाराम महाराजांनी रचलेल्या व्यवहार ज्ञानाविषयीच्या अभंगांचा आपण परामर्श घेऊ.
क्रमशः… १५
© अरुणा मुल्हेरकर
डेट्राॅईट (मिशिगन) यू.एस्.ए.
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

















