मराठी साहित्य – विविधा ☆ मला समजलेली संत तुकारामांची अभंग गाथा… भाग – २५ ☆ अरुणा मुल्हेरकर ☆

अरुणा मुल्हेरकर

? विविधा ?

☆ मला समजलेली संत तुकारामांची अभंग गाथा… भाग – २५ ☆ अरुणा मुल्हेरकर ☆

नीती आणि धर्म

आत्तापर्यंतच्या चोवीस भागातून आपण संत तुकारामांच्या अनेक विषयांवरील अभंगांचा अभ्यास केला. या भागात त्यांनी माणसाच्या नीती आणि धर्माविषयी रचलेले काही अभंग आपण पाहू.

रडोनिया मान/ कोण मागता भूषण/

देवे दिले तरी गोड/ राही रुची आणि कोड//

लाविता लावणी/ विके भिके केज्या दानी//

तुका म्हणे धीरा/ विण कैसा होतो हिरा//

या अभंगात माणसाने खरेपणाने आणि धीराने वागावे असे महाराजांना लोकांना सांगायचे आहे. मला मान द्या असे रडगाणे लावून जर कोणी मान देत असेल तर त्यात काय मोठे भूषण आहे? लहान मुलाने रडावे आणि आपला हट्ट पुरा करावा तसाच हा प्रकार आहे. न मागता मिळतो तो खरा मान, मोठेपणा. म्हणून माणसाची वृत्ती समाधानी असावी. परमेश्वराने माझ्या पदरात जे दान टाकले आहे, ते गोड मानले आणि त्यात समाधान ठेवले तर ते खरे सुख आहे. उदाहरणादाखल महाराज पुढे सांगतात की, शेतात स्वतः राबून पिकवलेले धान्य दान केले तर त्यात खरे समाधान आहे. भीक मागून किंवा दुसऱ्याचे ओरबाडून घेतले आणि दानात दिले तर त्या दानाला काही अर्थ नाही. कोणत्याही प्रकारच्या उतावळेपणाने मोठेपणा मिळत नाही. जो धैर्यवंत असतो त्यालाच हिऱ्याची योग्यता लाभते.

पुढे ते सांगतात, ज्याला स्वहित साधायचे आहे त्याने नीती धर्माच्या खुणा, संकेत पाळणे अत्यंत जरुरीचे आहे.

पूज्या एकासनी आसनी आसन/

बैसता गमन मातेशी ते//

सांगतो ते धर्म नितीचा संकेत/

सावधान हित व्हावे तरी//

संता ठाया ठाव पूजनाची इच्छा/

जीवनीच वळसा सापडला//

तुका म्हणे एकाएकी वरासने/

 दुजे तेथे भिन्न अशोभ ते//

प्रत्येकाने आपली मर्यादा ओळखून वागावे. ज्या आसनावर पूज्य अशा देवांची मूर्ती असेल किंवा गुरु बसलेले असतील, त्या आसनावर आपण बसू नये. ते पाप आहे. स्वतःची योग्यता नसताना, संतांप्रमाणे आपली ही पूजा व्हावी असे ज्याला वाटते, तो भवसागरात गटांगळ्या खातो आहे असे समजावे. श्रेष्ठ आसनावावर संत बसले असताना आपण तेथे जाऊन बसणे म्हणजे स्वतःची शोभा करून घेण्यासारखे आहे.

यासी कोणी म्हणे नींदेची उत्तरे/

नागवला खरे तोचि एक//

 आडवाट जाता लावी नीट सोयी/

धर्मनिती तेही ऐसी आहे//

नाइका सुखे करावे ताडण/

पाप नाही पुण्य असे फार//

जन्मव्याधी फार चुकतील दुःखे/

खंडावा हा सुखे मान त्याचा//

तुका म्हणे निंब दिधल्यावाचून/

अंतरीचा शीण कसा जाय//

 महाराजांना या अभंगात मुख्यतः काय सांगायचे आहे? तर ते म्हणजे दुर्जनाला शासन झालेच पाहिजे. कोणाला माझे हे भाषण निंदा वाटेल, पण ही निंदा नाही. कोणी आड मार्गाला जात असला तर त्याला सुयोग्य मार्गाला लावणे ही खरी धर्मनिती आहे. चांगल्या नीतीची गोष्ट सांगत असता जर कोणी ती ऐकली नाही तर त्याला खरपूस मार द्यावा. (शब्दांचा) त्यात पाप नसून ते पुण्यकर्मच ठरेल. असे केल्याने जन्मरूपी व्याधी आणि इतर अनेक दुःखातून त्याची सुटका होईल. म्हणून त्याची मानखंडना सुखाने करावी. अंग तापाने फणफणल्यावर त्याला कडुलिंबा सारखे कडू औषध द्यावे लागते ना? दुर्जनाला सुधारण्यासाठी शिक्षा करणे क्रमप्राप्त आहे.

एका विठ्ठलाच्या चरणाशी सर्व नीती, धर्म शास्त्र आहे. म्हणून तुकाराम महाराज सर्व लोकांना विठ्ठलापाशी भक्ती भाव ठेवण्यास सांगतात.

पृथक मी सांगो किती/ धर्म नीती सकळ/

अवघीयांचा एक ठाव/ शुद्ध भाव विठ्ठली//

क्षरा अक्षराचा भाग/ करा लाग पंढरीये/

तुका म्हणे आगामीचे/ मथिले साचे नवनीत//

 महाराज म्हणतात की ते प्रत्येकाला धर्म आणि नीती विषयी वारंवार किती सांगणार? एकच करा, सर्वांनी विठ्ठलाच्या चरणी शुद्ध भाव ठेवावा. हेच धर्म आणि नीतीचे तात्पर्य आहे. तो क्षर ( सगुण) आणि अक्षररूप ( निर्गुण) पंढरपुरात आहे, त्या ठिकाणी सगळ्यांनी अवश्य जावे. सर्व शास्त्ररुपी दही घुसळून काढलेले लोणी म्हणजे प्रत्यक्ष विठ्ठल हे दैवत तेथे आहे. भगवंताचे ध्यान अंतःकरणांमध्ये करणे हीच त्याची पूजा आहे. या वाचून सर्व वेगवेगळ्या उपाधी पापमूलक आहेत. त्या उपाधींचा संकल्प सुद्धा करू नये. लोकहो, भगवंताने श्रुती आणि स्मृती मध्ये ज्या आज्ञा दिल्या आहेत, त्याप्रमाणे आचरण ठेवणे, हाच खरा धर्म आहे. हा धर्म पाळल्याने सहज स्थिती प्राप्त होईल, ज्या स्थितीचा तुम्हाला कधी वीट येणार नाही. मनाची स्थितप्रज्ञता ही सहज स्थिती आहे. त्यामुळे सुखाने अति आनंद होणार नाही किंवा दुःखाने अतीव दुःख होणार नाही.

नीतिमत्तेबद्दल तुकाराम महाराज आणखी काय सांगतात ते पाहूया.

नये पाहो मुख मात्रागमन्याचे/

तैसे अभक्त्याचे गुरुपुत्रा//

म्हणउनी बरे धरिता एकांत/

तेणे नवे घात भजनासी//

नये होऊ कदा निंदकाची भेटी/

जया द्वैतपोटी चांडाळाच्या//

*तुका म्हणे नको बोलो त्यासी गोष्टी/

जयाचिया दृष्टी पापवाढे/

त्यांचे म्हणणे असे आहे की, जो विकृत वृत्तीचा आहे, (मात्रागमन्या )- मातेशी गैर वृत्तिने वागणार्‍याचे तोंड कधी पाहू नये. गुरुची निंदा करणाऱ्या शिष्याचे, हरीची निंदा करणाऱ्याचे मुखही पाहू नये. आपल्या भक्तीत, भजन कीर्तनात कोणत्याही प्रकारचा व्यत्यय येऊ नये यासाठी एकांतात राहणे सर्वोत्तम! निंदकाची भेट घेणे टाळावे, कारण त्याच्या तोंडात गोडवा असला तरी पोटात कपट असते. अशा माणसांना नुसत्या पाहण्याने सुद्धा पाप वाढते. नीती धर्माच्या कल्पना जनसामान्यांच्या मनात रुजविण्यासाठी तुकाराम महाराज काही दृष्टांत देतात.

अग्निमाजी पडे धातू/ लीन होऊनी राहे आंतु/

होय शुद्ध न पावे धातू/ पटतंतूप्रमाणे//

बाह्य रंगाचे कारण/ मिथ्या अवघेची भूषण/

गर्व ताठा हे अज्ञान/ मरण सवे वाहतसे//

पुरे मातलिया नदी/ लव्हाळा नांदे जीवनसंधी*/

वृक्ष उन्मळोनी भेदी/ परी तो कधी भंगे ना//

हस्ती परदळ जो भंगी/ तया पायी न मरे मुंगी/

कोण जाय संगी/ पाणोवाणी तयाच्या//

पिटीता घणेवरी सैरा/ तया पोटी राहे हिरा/

तैशा काय तगती गारा/ तया थोरा होऊनी//

लीन दीन हेचि सार/ भव उतरावया पार/

पुढे माथा भार/ तुका म्हणे वाहोनी*//

माणसाने नेहमी दीन असावे. हा गुण किती चांगला आहे त्याची उदाहरणे महाराज देतात.

१) अग्नीमध्ये पडलेले सोने न जळता शुद्ध होते, परंतु वस्त्र किंवा धागा आगीत पडला तर त्याचा नाश होतो. बाह्यात्कारी भूषणे हा केवळ दिखावा असतो.

२) गर्व किंवा ताठा हे केवळ अज्ञान आहे. जीव गेला तरी अज्ञान तसेच राहते.

३) महापूर आला तर वृक्ष उन्मळून पडतात आणि लव्हाळी मात्र तशीच टिकून राहतात. * वृक्षवल्ली जाती तेथे लव्हाळे वाचती ज्ञानेश्वरांनी सुद्धा हेच सांगितले आहे.

४) हत्ती शत्रूचा विध्वंस करतो, परंतु त्याच्या पायाखाली मुंगी मरत नाही. म्हणून हत्तीच्या मागोमाग झुंज खेळायला कोण जाणार?

५) हिरा घणाने फुटत नाही, पण गारा हिर्‍या पेक्षा मोठ्या असल्या तरी त्या घणाखाली टिकतात का?

 या सर्व उदाहरणांचा अर्थ एकच की, सर्वांनी दीन पणाने नम्र होऊन रहावे. मोठेपणाची ऐट कधी, कशाने गळून पडेल हे सांगता येत नाही. नम्रता, लीनता हे भवसागर पार करण्याचे फार मोठे साधन आहे. ज्याला मोठेपणाचा गर्व असेल

तो या भवसमुद्रात बुडून जाईल.

पुढील लेखात तुकाराम महाराजांनी रचलेल्या व्यवहार ज्ञानाविषयीच्या अभंगांचा आपण परामर्श घेऊ.

क्रमशः… १५ 

© अरुणा मुल्हेरकर 

डेट्राॅईट (मिशिगन) यू.एस्.ए.

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ तिची पेन्शन : स्वाभिमानाची नवी ओळख… – लेखिका : तृप्ती देव   ☆ प्रस्तुती – स्मिता सुहास पंडित ☆

स्मिता सुहास पंडित

? जीवनरंग ?

☆ तिची पेन्शन : स्वाभिमानाची नवी ओळख… – लेखिका : तृप्ती देव  ☆ प्रस्तुती – स्मिता सुहास पंडित ☆

घर सांभाळणाऱ्या हातांना पगार नसतो… पण सन्मानाची पेन्शन तरी असायला हवी.

सकाळचे साडेसात वाजले होते. स्वयंपाकघरातून कुकरच्या सलग तीन शिट्ट्या झाल्या, पाठोपाठ फोडणीचा खमंग वास घरभर दरवळत होता. घरात नेहमीसारखीच सकाळची लगबग सुरू होती.

“आई, आता तुम्ही जरा बसा बरं. भाजी झालीच आहे. चपात्या मी लाटते. सकाळपासून धावताय, जरा आराम करा, ” सून नेहा प्रेमाने म्हणाली.

छप्पन्न वर्षांच्या अलकाताई हसल्या…

“अगं, अजून राहुलचा डबा भरायचा आहे. तुझ्या दोघांचं दही ठेवायचं आहे. आणि हो, राहुलच्या आवडीची सुक्या खोबऱ्याची चटणी केली आहे आज. “

तेवढ्यात बेडरूममधून राहुलचा आवाज आला… 

“आई… माझा निळा शर्ट कुठे आहे गं?”

“कपाटात डाव्या बाजूला तिसऱ्या कप्प्यात बघ. “

“मिळाला. “

तिकडे डायनिंग टेबलवर बसलेले सुधीरराव वर्तमानपत्र वाचत होते.

“अलका, चहात साखर जरा कमी घाल बरं का. डॉक्टरांनी सांगितलंय. “

“हो, लक्षात आहे माझ्या. “

“बाबा, मी आणते चहा, ” नेहा म्हणाली.

त्यावर सुधीरराव हसले.

“अगं, तुझ्या हातचा चहा छान असतो. पण तुझ्या सासूबाईंच्या हातच्या चहाची मला पस्तीस वर्षांची सवय आहे. “

घरात सगळं सुरळीत होतं. मुलगा, सून, नोकरीतून निवृत्त झालेले सुधीरराव आणि या सगळ्यांच्या मध्यभागी अलकाताई.

कोणाला काय हवं, कोणाला काय आवडतं, कोणाची तब्येत कशी आहे, घरात काय संपलंय, कोणाचा वाढदिवस कधी आहे, या सगळ्याचं चालतं-बोलतं व्यवस्थापन म्हणजे अलकाताई. त्यांच्याशिवाय घरातलं पानही हलत नव्हतं. तिची घराला आणि तिला घरची सवय झाली.

पण दुर्दैवाने त्यांच्या या कामाला ना पगार होता, ना रजा, ना पदोन्नती. कारण घरातल्या प्रत्येकाला वाटायचं…

‘ आई आहेत ना… त्या करतील.’

राहुल आणि नेहा ऑफिसला निघून गेले. घरात शांतता पसरली. अलकाताईंनी शेवटचं आवरलं आणि दोन कप चहा घेऊन त्या सुधीररावांच्या शेजारी येऊन बसल्या.

आज सुधीरराव खूप आनंदात दिसत होते. त्यांनी मोबाईल पुढे केला.

“अलका, बघ. “

मोबाईलवर बँकेचा मेसेज होता. पेन्शन जमा करण्यात आली आहे.

सुधीरराव अभिमानाने म्हणाले, “आज पहिली पेन्शन आली. पस्तीस वर्षांच्या नोकरीचं फळ. आता आयुष्य निवांत जाईल. “

अलकाताईंनी मोबाईलकडे पाहिलं, मग त्यांच्या चेहऱ्याकडे. चहाच्या कपातून निघणाऱ्या वाफेसोबत त्यांच्या डोळ्यांसमोर पस्तीस वर्षांचा संसार तरळून गेला.

राहुल लहान असताना तापाने फणफणत होता, तेव्हा सलग तीन रात्री जागून काढलेले दिवस… सासूबाईंच्या आजारपणात केलेली सेवा… सुधीररावांच्या बदल्यांमुळे पुन्हा पुन्हा उखडलेलं घर… मुलांच्या शिक्षणासाठी स्वतःच्या इच्छा बाजूला ठेवलेले क्षण… या सगळ्यात साडी घ्यायची राहिली, मैत्रिणींसोबत फिरायला जायचं राहिलं, अगदी स्वतःकडे लक्ष द्यायचंही राहून गेलं.

त्या हळूच म्हणाल्या,

“अभिनंदन हो. “

“धन्यवाद. “

काही क्षण शांतता पसरली.

मग अलकाताईंनी विचारलं,

“एक विचारू?”

“विचार ना. “

“तुम्ही आता रिटायर झालात ना?”

“हो. “

“मग माझं रिटायरमेंट वय किती?”

सुधीररावांनी वर्तमानपत्र खाली ठेवलं.

“म्हणजे?”

अलकाताई शांतपणे बोलू लागल्या.

“तुमची नोकरी पस्तीस वर्षांची होती. वयाची साठ वर्षं झाली आणि तुम्ही निवृत्त झालात. मीही पस्तीस वर्षांपासून या घरात काम करते आहे. लग्न झालं तेव्हा मी एकवीस वर्षांची होते. आज छप्पन्न वर्षांची आहे. माझी नोकरी कधी संपणार?”

सुधीरराव काही बोलले नाहीत.

अलकाताईंचा आवाज आता जरा भरून आला होता.

“मी पैशांचा हिशेब मागत नाहीये हो. हा संसार मी प्रेमाने केला. पण मला एक सांगा… मला कधी रविवार मिळाला का? मला कधी रजा मिळाली का? मी आजारी असताना मला कोणी म्हणालं का, आज तू आराम कर?”

सुधीरराव शांत होते.

अलकाताई पुढे म्हणाल्या,

“परवा शेजारच्या काकूंसोबत कीर्तनाला जायचं होतं. तिथे गरीब मुलांना खाऊ वाटायचा होता. पण माझ्याकडे जास्तीचें शंभर रुपयेही नव्हते. तुमच्याकडे मागायला संकोच वाटला. राहुलकडे मागावंसं वाटलं नाही. आणि मग मी गेलेच नाही. “

त्यांच्या डोळ्यात अश्रू आले.

“अहो, मला पैशांचा मोह नाही. पण नातवासाठी एखादं चॉकलेट घ्यायचं असेल… स्वतःसाठी एखादं पुस्तक घ्यायचं असेल… एखादी साधी साडी आवडली असेल… तर प्रत्येक वेळी मी कोणासमोर हात पसरावा का? माझ्या हक्काचे चार पैसे माझ्या हातात असू नयेत का?”

असं म्हणत त्या उठल्या. डोळे पुसले आणि पुन्हा स्वयंपाकघरात गेल्या. कारण दुपारच्या जेवणाची तयारी बाकी होती. गृहिणीचं काम कधीच संपत नसतं.

त्या रात्री सुधीररावांना झोप लागली नाही. पहिल्यांदाच त्यांनी अलकाताईंच्या आयुष्याचा इतक्या जवळून विचार केला.

– – आपल्याला पगार मिळाला. बोनस मिळाला… आता पेन्शनही मिळते आहे.

पण अलकाला काय मिळालं?… फक्त जबाबदाऱ्या?

दुसऱ्या दिवशी ते सकाळीच बँकेत गेले. त्यांनी एक नवीन खाते उघडलं आणि आपल्या पेन्शनमधून दर महिन्याला ठराविक रक्कम त्या खात्यात जमा होईल अशी व्यवस्था केली.

दुपारी ते घरी आले. अलकाताईंना त्यांनी एक नवीन कोरे पासबुक आणि एटीएम कार्ड दिलं.

अलकाताईंनी आश्चर्याने विचारले,

“हे काय आहे?”

“उघडून बघ. “

.. त्यावर नाव लिहिलं होतं… अलका सुधीर देशपांडे.

त्यांच्या डोळ्यांत पाणी आलं.

“हे माझं? पण कशासाठी?”

सुधीररावांनी त्यांचा हात हातात घेतला… 

“अलका, हा तुझ्या त्यागाचा मोबदला नाही. कारण तुझ्या त्यागाची किंमत मी कधीच मोजू शकत नाही. पण हा तुझा हक्क आहे. आजपासून माझ्या पेन्शनचा एक हिस्सा दर महिन्याला तुझ्या खात्यात जमा होईल. हा पैसा फक्त तुझा असेल. तुला कोणाकडेही मागावं लागणार नाही. पस्तीस वर्षे तू या घरासाठी जगलीस. आता थोडंसं स्वतःसाठी जग. “

अलकाताईंच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले.

त्या हळूच म्हणाल्या,

“मला पैशांचा आनंद नाही झाला हो. “

“मग?” सुधीररावांनी विचारलं.

अलकाताई हसल्या.

“आज पहिल्यांदा असं वाटलं… या घरात मी फक्त जबाबदारी नव्हते. माझं अस्तित्वही आहे. “

सुधीररावांनी त्यांचा हात घट्ट धरला.

त्या दिवशी अलकाताईंना पैसे मिळाले नव्हते. त्यांना मिळाला होता सन्मान. स्वाभिमान. आणि आयुष्यभर दिलेल्या योगदानाची दखल.

नोकरी करणाऱ्या माणसाला पेन्शन मिळते… पण घर उभं करणाऱ्या गृहिणीला किमान स्वाभिमानाची आर्थिक ओळख तरी मिळायला नको का?

अनेक स्त्रिया स्वतःच्या घराच्या जवाबदाऱ्या सांभाळताना स्वतःचं अस्तित्व विसरतात. त्यांचं पूर्ण आयुष्य संसारासाठी जातो. त्यांचे हक्क बनतो. पण पण त्याकडे दुर्लक्ष होत सगळं तुझंच आहे असं म्हणणं असतं. पण तसे अधिकार तिला मिळावे. हाच कथेचा उद्देश.

आज गरज आहे प्रत्येक घरात सुधीररावांसारखा विचार रुजण्याची. जोपर्यंत घर उभं करणाऱ्या ‘तिचा’ हा अधिकार तिला मिळत नाही, तोपर्यंत घराला खऱ्या अर्थाने घरपण येणार नाही. चला, आजच सुरुवात आपल्या घरापासून करूया आणि प्रत्येक गृहिणीला तिचा हक्क अन् स्वाभिमान मिळवून देऊया!”

लेखिका : सौ तृप्ती देव

भिलाई, छत्तीसगड 

 (कथा आवडल्यास नावासोबत शेअर करा) 

संग्राहिका – सौ. स्मिता पंडित

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून  ☆ मराठीचा घसरलेला टक्का ! – ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्री विश्वास देशपांडे

? मनमंजुषेतून ?

☆ मराठीचा घसरलेला टक्का ! – ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

परवा ‘क्रांतीज्योती विद्यालय मराठी माध्यम’ हा चित्रपट पाहिला. आजच्या गल्लाभरू चित्रपटांच्या दुनियेत एका वेगळ्या विषयावरचा हा चित्रपट पाहताना आनंद वाटला. मराठी शाळांची खालावत चाललेली धक्कादायक अवस्था आणि अस्तित्वाचा संघर्ष या चित्रपटाने अत्यंत ढळढळीतपणे समाजासमोर आणला आहे. हा चित्रपट पाहत असताना मला नुकताच काही दिवसांपूर्वी लागलेला इयत्ता दहावीचा निकाल आठवला. निकालानंतर वर्तमानपत्रात ठळक अक्षरांमध्ये एक मथळा (हेडलाईन) प्रसिद्ध झाला होता ‘ दहावीच्या परीक्षेत मराठी विषयात ९४, ००० विद्यार्थी अनुत्तीर्ण !’ आपल्याच मातृभाषेला दुय्यम स्थान दिल्यामुळे मुले चक्क मराठीत नापास झाली आहेत. ही संख्या थोडीथोडकी नाही.

” मला सगळ्या विषयात चांगले मार्क आहेत पण फक्त मराठीत गेलो… ” दहावी उत्तीर्ण एका विद्यार्थ्याचे हे उद्गार ! आम्हाला सगळ्या विषयात चांगले मार्क्स असले तरी आमच्या टॉप फाईव्ह मध्ये मराठी नसते. “आमची उज्ज्वल यशाची परंपरा ! आम्ही सर्व विषयांची उत्तम तयारी करून घेतो, ” असे मोठे मोठे बोर्ड लावणारे क्लासेस मराठी विषयाची तयारी करून घेताना कुठे जातात ?

एका बाजूला मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला म्हणून आपण आनंदाने आणि अभिमानाने स्वतःची पाठ थोपटून घेत आहोत; अर्थात, यात वावगे काहीच नाही. पण खरंच माझी मराठी टिकावी, तिची समृद्धी आणखी वाढावी यासाठी आपण मुळापासून काही प्रयत्न करतो आहोत का ? जेव्हा मुलांच्या मराठीतील नापासांचे हे धक्कादायक प्रमाण समोर येते, तेव्हा आपण क्षणभर गडबडतो, आपल्याला धक्काही बसतो. पण तो तेवढ्यापुरताच! या स्थितीला जबाबदार असलेला प्रत्येक घटक आपली जबाबदारी दुसऱ्यावर ढकलून मोकळा होतो. मुले म्हणतात, ” शाळेत मराठीचे तास नियमितपणे झालेच नाहीत. ” बऱ्याच वेळा मराठीचे तास दुसऱ्या विषयाला वापरले जातात. मराठी काय घरीही अभ्यासता येईल. अशी मानसिकता निर्माण केली जाते. दहावीचे शिक्षक म्हणतात, ” मुले आमच्याकडे येताना खालूनच कच्ची आली. ” प्रत्येकजण अशा सबबी देऊन आपली जबाबदारी दुसऱ्यावर ढकलून मोकळा होत असतो. पण या विषयावर आपण कधी मुळापासून यावर विचार करणार आहोत की नाही ?

‘असर’ (Annual Status of Education Report) चा मागील एक अहवाल सांगतो की, जी मुले दहावीत होती, त्यांना इयत्ता तिसरीत असताना पहिलीचे मराठी धडे वाचता येत नव्हते; तर आठवीत असताना दुसरीच्या स्तरावरील उतारा वाचता येत नव्हता. आज इतक्या वर्षांनंतरही या परिस्थितीत फारसा बदल झालेला नाही. आपल्या मुलांचे मार्कांचे एकूण टक्के वाढले असतीलही, पण ज्ञानाचा आणि मराठीचा खरा टक्का मात्र घसरला आहे. मराठी साहित्य संमेलनांचे भव्य आयोजन करणे, पुस्तक प्रदर्शने भरवणे किंवा दुकानाच्या पाट्या मराठीत लिहायला लावणे या गोष्टी भाषेच्या प्रसारासाठी उपयुक्त असतीलही; पण जोपर्यंत आपण मूळ आजारावर उपाय करत नाही, तोपर्यंत ही परिस्थिती सुधारणार नाही.

ज्यांनी ‘शांतिनिकेतन’ची स्थापना केली, ते गुरुदेव रवींद्रनाथ टागोर बंगाली भाषेबाबत कमालीचे आग्रही होते. त्या काळात बंगालमधील सरकारी नोकरदार आणि मध्यमवर्गीय लोक आपल्या मुलांना इंग्रजी शाळेत घालण्यात आणि इंग्रजी बोलण्यात धन्यता मानत होते. अशा विपरीत परिस्थितीत गुरुदेवांनी “मातृभाषेतील शिक्षण हेच सर्वात उत्तम शिक्षण” असल्याचा उद्घोष केला. केवळ बोलून न थांबता त्यांनी शांतिनिकेतनमध्ये केवळ बंगालीतूनच शिक्षण देण्यास सुरुवात केली आणि पाठ्यपुस्तकेही बंगालीत तयार केली. ‘आमार जीवन, आमार बानी’ (माझे जीवन, हीच माझी वाणी) हे त्यांचे घोषवाक्य होते. आम्ही मात्र आज स्वातंत्र्याला ऐंशी वर्षे होत आली, तरी इंग्रजी भाषेचे गोडवे गाण्यातच मग्न आहोत.

एकदा एका विद्यापीठाच्या पदवीदान समारंभाला रवींद्रनाथांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित केले होते. त्या काळी असे समारंभ आणि त्यातील भाषणे केवळ इंग्रजीतूनच होत असत (जी आजही होतात). उपस्थितांचीही तीच अपेक्षा होती; पण गुरुदेवांनी तो सगळा इंग्रजी राजशिष्टाचार (प्रोटोकॉल) धुडकावून लावला आणि थेट बंगालीत भाषण करून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. आपल्या भाषेचा असा अभिमान आपल्यात कधी जागी होणार?

आपले सरकार इंग्रजी शाळांना धडाधड परवानग्या देत आहे आणि दुसरीकडे मराठी शाळांची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. “मराठी शाळांचा दर्जा खालावला आहे” असा बागुलबुवा उभा करून पालकांनी आपल्या मुलांना मराठी शाळांमध्ये पाठवणे बंद केले. परिणामी, ‘विद्यार्थी नाहीत’ हे कारण पुढे करून शासनाने शाळा बंद करण्याचा सपाटा लावला आहे. ज्या काही शाळा आज कशाबशा सुरू आहेत, त्यांची अवस्था केविलवाणी आहे; कुठे छप्पर गळतेय, तर कुठे पुरेसे शिक्षक नाहीत.

‘क्रांतीज्योती विद्यालय मराठी माध्यम’ या चित्रपटात हेच विदारक वास्तव अचूक मांडले आहे. विद्यार्थीसंख्या कमी झाली म्हणून शासनाकडून शाळा बंद होण्याची टांगती तलवार जेव्हा मानेवर येते, तेव्हा त्या शाळेचे मुख्याध्यापक दिनकर शिर्के (सचिन खेडेकर) शाळा वाचवण्यासाठी माजी विद्यार्थ्यांना हाक मारतात. हा चित्रपट आपल्याला एक मोठा धडा देतो. सरकार शाळा बंद पाडत असले आणि समाज उदासीन असला, तरी ज्या शाळेने आपल्याला घडवले, तिच्या पडत्या काळात तिच्या पाठीशी उभे राहणे ही प्रत्येक माजी विद्यार्थ्याची आणि समाजाची नैतिक जबाबदारी आहे. हे दुष्टचक्र मोडून काढण्यासाठी समाज, शिक्षक, पालक, माजी विद्यार्थी आणि शासन या सर्वांनी आता एकत्र यायलाच हवे.

‘मी मराठी, माझी शाळा मराठी’ हे आता केवळ वाक्य न राहता आपले ब्रीदवाक्य व्हायला हवे. आमचा इंग्रजीला अजिबात विरोध नाही, ती काळाची गरज म्हणून महत्त्वाची भाषा आहेच आणि ती पुढेही शिकता येते. पण ज्या गोष्टी मातृभाषेतून आमचे मूल सहजपणे आणि आत्मविश्वासाने शिकू शकते, त्या गोष्टी सुरुवातीलाच परक्या भाषेतून लादून त्याच्यावर ताण का आणायचा ? मराठी शाळांमधून केवळ कोरडे शिक्षण दिले जात नाही, तर आपली संस्कृती, शिष्टाचार आणि उत्तम संस्कार तिथे जोपासले जातात. जर आपल्याला आपली संस्कृती टिकवायची असेल आणि मुलांवर सुसंस्कार हवे असतील, तर मराठी शाळा आणि मराठी माध्यम अपरिहार्य आहे.

मुलांना मराठीची खरी गोडी शालेय स्तरापासूनच लागली पाहिजे; ती केवळ ‘एक परीक्षा’ म्हणून अभ्यासली जाऊ नये. ही गोडी निर्माण करण्याची जबाबदारी शिक्षक, पालक आणि संपूर्ण समाजाने उचलली पाहिजे. मुलांच्या पाठ्यपुस्तकातील धडे, कविता त्यांना मराठीची गोडी निर्माण होईल अशा असाव्यात. घरातही मराठी पुस्तके, वर्तमानपत्रे यावीत. पालकांनी देखील मुलांसमोर दर्जेदार अशी मराठी पुस्तके स्वतः वाचावीत. सुरुवात नेहमी स्वतःपासून करावी लागते. नुसते वाचन करा म्हणून सांगितले तर मुले ऐकणार नाहीत. यासोबतच, भविष्यातील स्पर्धा परीक्षांमध्ये आणि नोकऱ्यांमध्येही मराठीला मानाचे व अनिवार्य स्थान मिळाले पाहिजे. “मराठी शिकल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही” हे जेव्हा मुलांच्या आणि पालकांच्या लक्षात येईल, तेव्हाच मराठीच्या अभ्यासाला खऱ्या अर्थाने प्राधान्य मिळेल.

आपल्याला केवळ गणित, विज्ञान, इतिहास किंवा भूगोल येऊन उपयोग नाही; आपल्याला आपली मातृभाषाही उत्तम लिहिता, बोलता आणि वाचता आली पाहिजे. “माझा मराठाचि बोलू कौतुके। परी अमृतातेही पैजा जिंके।” या माउलींच्या उद्गाराची अनुभूती आमची मुले केव्हा घेणार ? जेव्हा त्यांना मराठी भाषेत खरोखर रस वाटू लागेल तेव्हाच ना ! आणि याच मराठी मातीतून उद्याचे उत्तम साहित्यिक, वक्ते, शास्त्रज्ञ आणि समाजाला दिशा देणारे समाजसेवक निर्माण होतील. तेव्हाच आपण खऱ्या अर्थाने आणि गर्वाने म्हणू शकू…

“लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी… “

© श्री विश्वास देशपांडे

चाळीसगाव

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ”मला ब्रेक हवाय !” ☆ संध्या बेडेकर ☆

संध्या बेडेकर

? मनमंजुषेतून ?

☆ “मला ब्रेक हवाय !” ☆ संध्या बेडेकर ☆

If you are tired, learn to take a rest. Take break.

मला break हवाय.

आज सकाळपासूनच माझी चिडचिड सुरू होती. इतक्यात हे अस बरेचदा होतय. म्हणजे उगीच चिडचिड करायला मी काही वेडी नाही. तसा माझा स्वभाव ही नाही. ही चिडचिड सध्या तरी स्वतःपर्यंतच आहे. मी नोकरी करत नाही, पण घर सांभाळण घरातील सर्वांची ची वेळ, डबे, त्यांचे मूड, चिडचिड खाण्याचे नखरे, जेष्ठांचे औषधपाणी, घराचे मेंटेनन्स, सांभाळणे हे काही सोप्प काम नाहिये. आणि ते फक्त काही दिवसांचे / महिन्यांचे नाही तर वर्षानुवर्ष तेच ते चालू आहे. थोडक्यात हे म्हणजे सर्वांच्या तालावर नाचणेच झाले नाही का ? खरतर हे सर्व करण्यात मला आनंदच मिळतो. आवडत मला. त्यांच्या आवडीनिवडी लक्षात ठेवून स्वयंपाक करण खरच आवडत मला. जसजस माझ वय वाढतय तसतशी माझ्या एक गोष्ट लक्षात आली की थोडी चूक झालीच आहे माझी. सर्व मनासारख, सतत त्यांच्या सेवेत मागेपूढे हजर राहणे.

हे बरोबर नाही. एकतर त्यांच्या सवयी बदलतात. काम करायची सवय नाही. उद्या अजयचे लग्न झाले तर ती सून पण कदाचीत अजयला म्हणेलही… की तुमच्या आईने तुम्हाला काही सवयी लावल्या नाहीत. खूप लाडावून ठेवल आहे. आज नोकरी करणारी सून येण्याची शक्यता जास्त आहे, तेंव्हा नवर्याचे सहकार्य अपेक्षित असतेच.

 हे सर्व विचार मला अस्वस्थ करतायेत. हे अस का होतय ? हा विचार मला अस्वस्थ करतोय. वय झालय म्हणण्यापेक्षा वय वाढतय, हे म्हणण जास्त योग्य होईल., तस म्हंटल तर 50/52 वर्ष वय म्हणजे काही खूप नाहीच. शक्ती कमी झालीय की काही आजार वगैरे? आता कुठे सून आणायची वेळ आली आहे.

मी माझा प्रोब्लेम घरात सांगीतला नाही तर, त्यांना कळेल कसा ? हे अस ओढून ताणून घर चालवण बरोबर आहे का ? उद्या मी च आजारी पडले, तर सर्वांनाच जास्त त्रास होईल. मला विश्रामाची गरज आहे का ? ब्रेक हवाय का ?

हे विचार मनात घर करून बसले आहेत.

 आज दुपारी आईंना चहा देतांना, आई म्हणाल्याच… काय ग अनिता ? काय विचार करतेय ? आज तुझ्या भावाचा फोन आला होता ना. सर्व ठीक आहे ना त्यांच्याकडे. बर वाटत नाहीये का ? अजय काही बोलला का ? इतक्यात लक्षात आलय, तू नेहमीसारखी प्रसन्न दिसत नाही.

आईंच्या तीक्ष्ण नजरेत काहीच सूटत नाही. हे खरय.

मी म्हंटल… आई अहो.. माहित नाही का ? पण मला सध्या थकवा जाणवतोय. उत्साह वाटत नाही.

अग! मग सांगायच न. तू सांगितल नाही तर कळेल कस?

 आई अहो ! तुम्हाला सांगायच अस माझ बरेचदा ठरवून झाल हो. पण पुन्हा तेच… पुत्र प्रेम, पति प्रेम आड येत, जबाबदारी आठवते.

आणि मी काहीच बोलत नाही.

 आता मात्र बदल करायची वेळ आली आहे. हे कळतय मला.

आई म्हणाल्या… अग बाई !

आता आईपणा, सूनपणा, बायकोपणा, सर्वच बाजूला ठेव जरा. अग ! देवी बनायचा प्रयत्न करू नको. ब्रेक घे.

 नाही म्हणजे.. सहन करायची / ऐकायची एक लिमिट असते ग.

उद्या तुझी तब्येत बिघडली तर ? कोण लक्ष देणार आहे ? 

घर एक घर आता पूरे झाल.

अग! मी केलेली चूक तू करू नकोस.

अग! शांत राहण चांगली सवय आहे. ज्या घरातील स्त्री शांत स्वभावाची असते, ते घर छानच चालत. पण कोणत्याही परिस्थितीत, कितीही त्रास असताना शांत राहण म्हणजे आत्महिंसाच असते ती.

स्वतःपेक्षा जास्त दुसर्यांचा विचार करणे, महत्व देण हे कुठे तरी थांबवायला शिकलेच पाहिजे. स्वतःकडे दुर्लक्ष करण बरोबर नाही.

आई पूढे म्हणाल्या… अग! घर सांभाळताना मी पण स्वतःला विसरले होते. आणि आता मला स्वतःला आठवायला औषधांची गरज लागते.

आमच्या जमान्यातही बायका भजन क्लास, जेष्ठ नागरिक संघाच्या कार्यक्रमांना जायच्याच. त्या पण छानच घर सांभाळत होत्याच की.. मी आपली आता यांची यायची वेळ झाली, त्याची वेळ झाली याच विचारात असायची. मला कोणी नको जाऊ अस कधी म्हंटल नाही. माझ पण तेच असायच ना… घर एक घर 

अग! खूप पर्याय असतात / आहेतच.

आपल्या सोयीनुसार त्यांची सर्वीस घ्यायची. स्वतःसाठी हक्काने पैसे खर्च करायला शिकायच असत.

घरी खूप संपत्ती आहे मालमत्ता आहे. त्याचा उपभोग घ्यावा. जीवनशैली गरज पडेल तशी बदलावी ना. मीच सर्व काम करेन, हा हट्ट का ? 

आजोबा सर्व शांतपणे ऐकत होते.

थोड्याच वेळात अजय आणि बाबा ऑफिस मधून परत आलेच.

अजय म्हणाला… या रविवारी Mother’s Day I love. My Mom, and Aaji too.

कस celebrate करायच ? Mom आजी कुठे जायच? सांगा.

आजोबा म्हणाले… अरे फक्त Mother’s Day लाच आई, आजी आठवतात का ? बाकी कधी काही चौकशी केली आहे का ? अरे! आमची देखरेख तुझी आई करते. तिला काय हवय ? काय आवडत ? एखादा तिच्या आवडीचा सिनेमा तिला बघायचा आहे का ? हे कधी विचारल का तिला ? 

तिच्याजवळ बसून काही विचारपूस वगैरे केली का ? कधी.

अरे! लग्न झाल्यावर तुझी जबाबदारी वाढणार आहे. तिच्या बरोबर पण असच वागशील का ? 

आईवर तुझ प्रेम आहे, हे माहित आहे आम्हाला, कधी कधी ते दाखवायच पण असत ना… आपल्या कृतीतून, वागण्यातून, बोलण्यातून. नाहीतर तुझ्या मनातल तिला कस कळेल ?

हे बघ सध्या अनिताला डोॅक्टर कडे न्यायची गरज आहे. तिला काम केल्यावर थकवा वाटतोय.

आधी हे काम कर. मग जंगी पार्टी करूयात.

अरे!लहानपणी शिकवलय ना… रस्ता पार करताना आधी डावीकडे, मग उजवीकडे… पुन्हा डावीकडे बघायच आणि मग रस्ता पार करायचा.

अरे! आयुष्यातही वेगवेगळया वळणावर जरा थांबाव. सर्व दृष्टिने विचार करावा. आपली जबाबदारी, कर्तव्य आपण बरोबर करतोय ना. काही ऐकायच / विचारायच/ सांगायच राहून तर नाही गेल. याचा विचार करावा. फक्त महिला दिवस, Mother’s Day ला नाही तर हे आपल्या वागण्यात असाव.

प्रेमाच्या दोन शब्दांत खूप जादू असते. काळजीने केलेल्या विचारपूस मध्ये अर्ध अधिक बरे होण्याची ताकद असते.

बरे असो…

उद्यापासून आपल्या घरी स्वयंपाक करायला मावशी असणार आहेत. अनिता ! त्यांची पूर्ण तयारी झाल्यावर फोडणीचे काम मात्र तूच कर. तुझ्या हातची भाजी आमटी आवडते सर्वांना. फक्त तेवढच करायच हं.. हे लक्षात ठेव.

माझ्याकडून Mother’s day ची दोन्ही आयांना हीच भेट.

हो फक्त Mother’s Day ला नाही तर नेहमीसाठी.

बाबा म्हणाले…

अग ! अनिता घरातील सगळ्यांची देखभाल करताना, स्वतःला विसरायच नसत. स्वतःवर प्रेम करायला शिकायच असत. तू या घरासाठी खूप मौल्यवान आहेस.

 

© संध्या बेडेकर 

वारजे, पुणे.  

7507340231

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ॥ गंगालहरी॥ ☆ भाग – २ – कवी : श्री जगन्नाथ पंडित ☆ मराठी भावानुवाद – डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

डाॅ. निशिकांत श्रोत्री 

? इंद्रधनुष्य ?

☆ ॥ गंगालहरी॥ ☆ भाग – २ – कवी : श्री जगन्नाथ पंडित ☆ मराठी भावानुवाद – डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

श्लोक ११ ते २०

महादानैर्ध्यानैर्बहुविधवितानैरपि च यन्

न लभ्यं घोराभिः सुविमलतपोराशिभिरपि ।

अचिन्त्यं तद्विष्णोः पदमखिलसाधारणतया

ददाना केनासि त्वमिह तुलनीया कथय नः ॥ ११॥

*

नृणामीक्षामात्रादपि परिहरन्त्या भवभयं

शिवायास्ते मूर्तेः क इह महिमानं निगदतु ।

अमर्षम्लानायाः परममनुरोधं गिरिभुवो

विहाय श्रीकण्ठः शिरसि नियतं धारयति याम् ॥ १२॥

*

विनिन्द्यान्युन्मत्तैरपि च परिहार्याणि पतितै-

रवाच्यानि व्रात्यैः सपुलकमपास्यानि पिशुनैः ।

हरन्ती लोकानामनवरतमेनांसि कियतां

कदाप्यश्रान्ता त्वं जगति पुनरेका विजयसे ॥ १३॥

*

स्खलन्ती स्वर्लोकादवनितलशोकापहृतये

जटाजूटग्रन्थौ यदसि विनिबद्धा पुरभिदा ।

अये निर्लोभानामपि मनसि लोभं जनयतां

गुणानामेवायं तव जननि दोषः परिणतः ॥ १४॥

*

जडानन्धान् पङ्गून् प्रकृतिबधिरानुक्तिविकलान्

ग्रहग्रस्तानस्ताखिलदुरितनिस्तारसरणीन् ।

निलिम्पैर्निर्मुक्तानपि च निरयान्तर्निपततो

नरानम्ब त्रातुं त्वमिह परमं भेषजमसि ॥ १५॥

*

स्वभावस्वच्छानां सहजशिशिराणामयमपा-

मपारस्ते मातर्जयति महिमा कोऽपि जगति ।

मुदायं गायन्ति द्युतलमनवद्यद्युतिभृतः

समासाद्याद्यापि स्फुटपुलकसान्द्राः सगरजाः ॥ १६॥

*

कृतक्षुद्रैनस्कानथ झटिति सन्तप्तमनसः

समुद्धर्तुं सन्ति त्रिभुवनतले तीर्थनिवहाः ।

अपि प्रायश्चित्तप्रसरणपथातीतचरिता-

न्नरानूरीकर्तुं त्वमिव जननि त्वं विजयसे ॥ १७॥

*

निधानं धर्माणां किमपि च विधानं नवमुदां

प्रधानं तीर्थानाममलपरिधानं त्रिजगतः ।

समाधानं बुद्धेरथ खलु तिरोधानमधियां

श्रियामाधानं नः परिहरतु तापं तव वपुः ॥ १८॥

*

पुरो धावं धावं द्रविणमदिराघूर्णितदृशां

महीपानां नानातरुणतरखेदस्य नियतम् ।

ममैवायं मन्तुः स्वहितशतहन्तुर्जडधियो

वियोगस्ते मातर्यदिह करुणातः क्षणमपि ॥ १९॥

*

मरुल्लीलालोलल्लहरिलुलिताम्भोजपटली-

स्खलत्पांसुव्रातच्छुरणविसरत्कौङ्कुमरुचि ।

सुरस्त्रीवक्षोजक्षरदगरुजम्बालजटिलं

जलं ते जम्बालं मम जननजालं जरयतु ॥ २०॥

– – – – 

मराठी भावानुवाद 

लाभ जयाचा नाही ध्याने अमाप दानाने

घोर तपस्ये प्राप्त न होई विविध यागाने

या सकलांहुनी प्रभावशाली गङ्गे तव दर्शन

सामान्यांसी प्राप्ती सहजी माधवपद पावन ॥११॥

*

एक कटाक्षे तुझिया होते भवभयहारण

तव मूर्ती करि जगताचे या सदैव कल्याण

क्षुब्ध जाहल्या शैलजेस त्या महेश सोडून

सदोदीत तुजला मस्तकावरी करितो धारण ॥१२॥

*

जगात भरली असंख्य पापे उन्मत्त बोल

निंदक भेदी धर्म सांडिती आक्रमिती टवाळ

समस्त पातकी पापे क्षालित तुझिया पाण्यातुन

निर्मल विजयी प्रवाह हा तव एकचि विश्वातुन ॥१३॥

*

पतीत दीन उद्धारास्तव अवतर अवनीवरी

बांधुनिया निजपाशी कुंतले ठेवी मन्मथअरी

निर्मोही तरी दोष मोह ठेवी तुजला बांधुन

दोष तुझा की सांग माते सारे सद्गुण ॥१४॥

*

पङ्गू अंध बधीर मूक मूढ पापी पीडित

पापांपासुन मुक्तिसाठी पांथस्थ रखडत

त्यागिती सर्व देव तयांसी नरकात जायचे

तूची श्रेष्ठ भेषज अससी उद्धार दीनांचे ॥१५॥

*

स्वाभाविक शीतल नि विमल नीर तुझे महान

महिमा त्याचा काय वदावा सर्वा करि पावन

तुझिया स्पर्शे मोक्ष मिळोनी गेले स्वर्गात

सगरपुत्र द्यूलोकी अजुनी स्तवन तुझे गात ॥१६॥

*

लघूपातकांचा होता पस्तावा मग जीवनी

पातकहरणा असंख्य असती तीर्थक्षेत्र त्रिभुवनी

पापांना ज्या नाही उतारा पश्चात्तापाचा

अनुपम पावन करुनी मार्ग दावि मुक्तीचा ॥१७॥

*

खजिना धर्माचा तो मुख्य तीर्थांचे स्थान

कितीक आमोदासी देशी प्रज्ञे समाधान

आच्छादुनी चिंतेसी ठेवी विमल वस्त्र परिधान

लक्ष्मीवास हरण करी दुःखा तव रूप छान ॥१८॥

*

आशा जोपासुनी धनाची मंदबुद्धी झालो

धनपिसाट राजांसामोरी नतमस्तक झालो

स्वार्थापोटी सोडुन निजहित मति का मूढावी

करुणामयी होई हे माते वियोग तव हटवी ॥१९॥

*

लहरींनी पवनाच्या जलतरंग जे उठले

पद्मपराग केशरवर्णी चहूकडे विखुरले

सुरस्त्रियांच्या वक्षांवरचे कर्दमगरूसम आले

ऐसे जल तव नष्ट करो मम जननमरण जाळे ॥२०॥

– क्रमशः भाग दुसरा – 

कवी : श्री जगन्नाथ पंडित 

मराठी भावानुवाद  © डॉ. निशिकान्त श्रोत्री

एम.डी., डी.जी.ओ.

मो ९८९०११७७५४ ईमेल nishikants@gmail. com

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “आठ हजार आठशे नव्वद दिवसांची प्रतीक्षा !” भाग – १ ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

“आठ हजार आठशे नव्वद दिवसांची प्रतीक्षा ! भाग – १  ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

भारतीय सेना… जिंदगी के साथ भी… जिंदगी के बाद भी! 

दोघांच्या मध्ये सुमारे चार हजार किलोमीटर्सचं भलं थोरलं अंतर होतं… ती त्याच्या वाटेकडे डोळे लावून बसली होती. नवरा फौजेत होताच… सुभेदार मेजर पोस्टवर होता Shillong मध्ये. पोराला दुसरं-तिसरं काहीही व्हायचंच नव्हतं… बापाच्या पाठोपाठ पोरगंही फौजेत गेलं तसं तिच्या काळजाचे दोन भाग झाले. एक भाग कुंकवाची चिंता करी तर दुसरा भाग म्हातारपणाच्या आधाराची. एकुलता एक तर लेक होता तो. त्याच्या आधी दोन मुली पदरात होत्या… पण पोरी लोकाच्या घरी जायच्या… उतारवयात आधार पाहिजेच की! पोराचे दोनाचे चार हात झाले आणि अंगणात नातवंडं खेळायला लागली की जन्माचं सार्थक झाल्याची स्वप्नं ती माऊली रंगवत दोघांचीही वाट पहात बसायची!

मुलाचं पत्र आलंय चारच दिवसांपूर्वी… ”अम्मा, येतोय सोळा-सतरा जूनला. माझ्या आवडीची ओल्या नारळाची बर्फी, चटणी आणि गरमागरम दोसे तयार ठेव. आणि हो, यावेळी माझ्या मागं लग्नाचं टुमणं नकोस लाऊस गं… एकच वर्ष तर झालंय मला फौजेत जाऊन. आणखी जरा स्थिर स्थावर होऊ दे. पुढची पोस्टिंग शांतता क्षेत्रात मिळेल बहुदा. अगं, इकडं खूप दमछाक होते… रोज अतिरेक्यांना शोधायला जातो आम्ही… कधी त्यांचे लोक मारले जातात.. कधी आमचे. पण तू काळजी करू नको. मला छान पैकी मी इथून निघण्याच्या आधी आमच्या मेस मध्ये सर्व अधिकारी, जवान सुग्रास जेवण देतील आणि निरोप देतील! पुन्हा कधी त्यांची भेट होईल न होईल… देव जाणे! पप्पा तिकडे शिलॉंगमध्ये पोस्टेड आहेत. त्यांना सुट्टी मिळाली असती तर आम्ही दोघेही एकाचवेळी घरी आलो असतो… शेतातली कामं मार्गी लावली असती. या दोघी अभ्यास करताहेत ना? त्यांच्यासाठीही काही आणीन छान यावेळी Nagaland मधून. येतो… काळजी घे… तुझाच… E. Thomos Joseph. Corps of Military Intelligence attached with 1/5 Gorkha Rifles. तारीख ११ जून १९९२.

उद्या निघायचं म्हणून ई. जोसेफ साहेब आज रात्रीच तयार झाले होते सामानसुमान बांधून. कालच मेसमध्ये पार्टी झाली निरोपाची. उद्या निघायचं कोट्टयमला.. सुंदर केरळमध्ये… पोहोचायला तीन-चार दिवस तर सहजी लागतील. बिछाण्यावर अंग टाकले आणि युनिटमध्ये जोरदार हालचाली सुरु झाल्या… अतिरेक्यांच्या मागावर एक QRT Quick Action Team निघाली होती… तिथून जवळच अतिरेक्यांचा एक मोठा गट असल्याची पक्की खबर होती! जोसेफ साहेब गणवेश परिधान करून तातडीने बाहेर पडले… सहकारी अधिकारी म्हणाले, “आप तो कल छुट्टीपर निकलने वाले हो… आज ऑपरेशनसे लौटने में देर होगी.. आप मत साथ आईये!” त्यावर सेकंड लेफ्टनंट जोसेफ साहेब म्हणाले, “छुट्टी तो कल से है… मैं तो आज duty पर हूं… मैं भी साथ चलूंगा!”

ते अतिरेकी विरोधी अभियान रात्रभर चालले… अतिरेक्यांना या अभियानाची खबर आधीच लागली होती… गावाजवळच्या जंगलात त्यांनी सापळा रचून ठेवला होता… त्यांच्या तावडीत गोरखा सैनिकांची ही तुकडी दुर्दैवाने सापडली… आपल्या सैनिकांनी जोरदार प्रत्युत्तर दिले… काही अतिरेकी जोसेफ साहेबांनी अचूक उडवले होते… पण अतिरेक्यांना यमसदनी धाडताना आपले तीन अधिकारी आणि दहा सैनिक धारातीर्थी पडले… त्यात ई. टी. जोसेफ साहेबही होते! त्या सर्वांचे कुटुंबीय आता कायम प्रतीक्षेत राहणार होते… जोसेफ साहेबांच्या मातोश्री थ्रीसिएम्मा जोसेफ सुद्धा!

Nagaland त्यावेळी धुमसत होतं… रस्ते बंद… रस्त्यांत हिंसक निदर्शने, लष्करी वाहनांवर दगडफेक, गोळीबार… एक ना अनेक गोष्टी सुरु होत्या. लष्कर याही परिस्थितीमध्ये संयम ठेवून काम करीत होतं… नेहमीप्रमाणे. जोसेफ साहेबांचे वडील सुभेदार मेजर थॉमस जोसेफ यांच्यापर्यंत लेकाच्या हौताम्याची बातमी पोहोचली… किती मोठा धक्का असेल त्या पितृहृदयासाठी… बाप के कंधे पे बेटे का जनाजा… किती मोठं ओझं हे! हे शल्य वागवीत ते शिलाँगवरून नागालँडकडे जायला निघाले… तेरा तासांचा प्रवास… पोहोचायला चार दिवस लागले… मालगाडीमधून प्रवास करावा लागला… काही ठिकाणी पायी जावे लागले! हुतात्म्यांचे देह आता कणा-कणाने निसर्गाच्या स्वाधीन होऊ लागले होते. त्याची दुर्गंधी सुटू लागली… भारतीय लष्कराच्या त्यावेळच्या व्यवस्थेनुसार गोरखा सैनिकांचे दाह-संस्कार युनिटमध्येच केले गेले. जोसेफ साहेब धर्माने ख्रिस्ती. त्यांना कोहिमामध्येच विधिवत दफन केले गेले… कारण तो देह इतक्या दूरवर पाठवणे दुरापास्त होते… अंत्यसंस्कार प्रसंगी केवळ त्यांचे वडीलच उपस्थित राहू शकले… आई, बहिणी आणि नातेवाईकांना अंत्यदर्शन होऊ शकले नाही!

सुभेदार मेजर जोसेफ साहेबांनी त्याच वर्षी सेनेतील नोकरी सोडली आणि ते आपली पत्नी, आणि दोन मुली यांना घेऊन त्यांच्या मूळ गावी निघून गेले… काळजात लेकाचा विरह घेऊन! यात सर्वांत दु:खी होत्या त्या मातोश्री थ्रीसिएम्मा!

त्या गावातल्या चर्चच्या मागील बाजूस असलेल्या दफनभूमीकडे बघायच्या तेंव्हा त्यांना भास होई… लेक तिथल्या एका कबरीमध्ये विसावला आहे… आणि आपण त्याच्या कबरीवर साधं फूल वाहू शकत नाही… इकडे हजारो किलोमीटर्स दूर अंतरावर एका तशा अज्ञात स्थळी, एकाकी अवस्थेत जोसेफ साहेबांचा आत्मा त्या कबरीत तळमळत असेल… आई नजरेस नाही पडली शेवटच्या क्षणी!

एक एक क्षण युगासारखा असतो दुखावलेल्या मनांसाठी. संसार सुरु राहतो… पण पायात रुतलेल्या काट्यासारखे दु;ख पावलोपावली साथ देत राहतं… वाटचाल वेदनेकडून आणखी वेदनेकडे. आई-बापाचे दु:ख दुस-या कुणाला कसे समजावे?

काळ पुढे सरकत गेला. जोसेफ कुटुंबीयांनी मग मुलींकडे लक्ष केंद्रित केले, त्यांना योग्य ते शिक्षण दिले… त्या दोघीही शिक्षिका झाल्या! आणि लेकाच्या आठवणीत हे दोन म्हातारे डोंगर आयुष्याचा सूर्यास्त होण्याची वाट पाहू लागले! लष्करी पार्श्वभूमी असल्याने जोसेफ साहेबांचे वडील तरी काहीसे खंबीर होते… मात्र आईची तगमग सुरूच होती… !

– क्रमशः भाग पहिला 

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “किचन = डिग्रीशिवायची युनिव्हर्सिटी”…  – लेखक : अज्ञात  ☆ प्रस्तुति – शामला पालेकर ☆

शामला पालेकर

? वाचताना वेचलेले ?

☆ “किचन = डिग्रीशिवायची युनिव्हर्सिटी”…  – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुति – शामला पालेकर

आपण IIT-IIM च्या डिग्रीला “इंटेलिजन्स” म्हणतो, पण जी बाई रोज सकाळी 6 ते रात्री 10 पर्यंत किचन नावाची कंपनी CEO सारखी चालवते, तिच्या IQ चं सर्टिफिकेट कोण देणार?

तू सांगितलेले 8 विषय + माझ्याकडून 2 एक्स्ट्रा:

विषय: किचनमध्ये काय होते?    बाहेरच्या जगात काय म्हणतात?

गणित: “4 लोकांसाठी 2 वाटी डाळ, पण सासूबाई आल्या तर 2. 5”     Resource Planning, Demand Forecasting

भौतिकशास्त्र: तेलाचा “तडतड” आवाज ऐकून तापमान कळणं     Thermodynamics + Acoustics

रसायनशास्त्र : दही लावताना ‘ऊब’ बरोबर लागली का?           Bio-chemistry + Fermentation Tech

मॅनेजमेंट:    गॅसवर डाळ, कुकरमध्ये भात, तव्यावर पोळी, मनात उद्याचा स्वयंपाक     Parallel Processing + Time Management

निरीक्षण:    पोळीचा ‘फुगा’ बघून गॅस कमी-जास्त करणं Quality Control + Visual Analytics

मल्टिटास्किंग : फोनवर नणंद, कुकरची शिटी, मूल “भूक” म्हणतंय – सगळं एकाच वेळी  Crisis Management + Prioritization

अर्थशास्त्र:    महिन्याचं बजेट 8 हजार, तरी 30 दिवस पोटभर जेवण     Microeconomics + Zero-Waste Policy

मानसशास्त्र: नवऱ्याचा चेहरा बघून ‘आज ऑफिसमध्ये टेन्शन आहे’ हे ओळखणं     Emotional Intelligence + Behavioral Science

बोनस 1: Nutrition: ताप आल्यावर पेज, पावसाळ्यात गरम सूप, परीक्षेला दूध-बदाम      Dietician + Preventive Healthcare

बोनस 2: Diplomacy: सासूला कमी तिखट, नवऱ्याला जास्त तिखट – एकाच भाजीत 2 चव Stakeholder Management

3 गोष्टी ज्या कुठल्याही MBA मध्ये शिकवत नाहीत:

  1. “उरलं-सुरलं” ची कला: रात्रीची पोळी → सकाळचा कुस्करा. भात उरला → दुसऱ्या दिवशी फोडणीचा भात. Waste = 0%. हे आहे Circular Economyचा बेस्ट नमुना.
  2. “मूड डिटेक्टर”: घरात कोणी उपाशी झोपलं तर तिला झोप लागत नाही. ती कॅलरी मोजत नाही, चेहऱ्यावरचं समाधान मोजते.
  3. “अदृश्य ओव्हरटाइम”: ऑफिसमध्ये 9-5 नंतर OT चे पैसे मिळतात. किचनमध्ये रात्री 11 ला मुलाला भूक लागली तर बिनपगारी एक्स्ट्रा शिफ्ट. तरी तक्रार नाही.

 म्हणूनच रावणाच्या सोन्याच्या लंकेपेक्षा आईच्या हातच्या वरण-भाताची किंमत जास्त.

 तू आधी पाठवलेल्या “Silent Kitchen” मेसेजचा पुढचा भाग हा आहे. अमेरिका किचन विसरली, म्हणजे तिने “डिग्रीशिवायच्या CEO”ला रिटायर केलं. परिणाम: कुटुंब तुटलं.

 जपान आजही जगात सर्वात जास्त जगतो कारण तिथे “ओफुकुरो नो अजी” = आईच्या हातची चव ही सांस्कृतिक संपत्ती मानली जाते.

 आज काय करायचं? 3 मिनिटांचं “थँक यू किचन” प्रोटोकॉल:

  1. जेवायच्या आधी: 3 सेकंद थांब. ताटाकडे बघ. मनात म्हण: “हे बनवणाऱ्या हातांना सलाम”.
  2. जेवताना: 1 घासानंतर “मस्त झालंय” बोलून दाखव. तिला पगार नको, पावती हवी.
  3. जेवणानंतर: स्वतःचं ताट स्वतः उचल. 2 मिनिटं तिला आराम दे. ती पण माणूस आहे, रोबोट नाही.

 डिग्री पेपरवर असते, इंटेलिजन्स तव्यावर असते.

इंग्लिश येत नसेल, पण ती 5 भाषेत बोलते – प्रेमाची, मायेची, जबाबदारीची, त्यागाची आणि संयमाची.

आज घरी गेल्यावर किचनच्या CEO ला एक कप चहा करून दे. बघ, तिच्या चेहऱ्यावरचा आनंद कुठल्या नोबेलपेक्षा कमी नसेल.

तुझ्या घरची “किचन युनिव्हर्सिटीची चॅन्सलर” कोण आहे – आई, बायको, ताई की तू स्वतः?

लेखक :अज्ञात

प्रस्तुती : शामला पालेकर

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ सुखी निद्रा! ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

श्री प्रमोद वामन वर्तक  

?️?  चित्रकाव्य  ?️?

? सुखी निद्रा! ?  श्री प्रमोद वामन वर्तक ☆

गाढ झोप तुझी माझी 

‘त्यानेच’ नशिबी लिहिली,

जरी होतसे उकाड्याने

साऱ्या अंगाची काहीली !

*

येईल कशी आठवण 

उदरातल्या आगडोंबाची,

भरतो स्वप्नातच खळगी 

भाकर तुकड्याने पोटाची !

*

जगूया उद्याच्या आशेवर 

मिळावे कोरड्याचे घास,

जगावे तर लागेल दोघां 

असेपर्यंत शरीरात श्वास !

असेपर्यंत शरीरात श्वास !

(चित्रकार – अनिल खरे, मिनिआपोलीस, USA)

© प्रमोद वामन वर्तक

संपर्क – दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.) 400610 

मो – 9892561086 ई-मेल – pradnyavartak3@gmail.com

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

English Literature – Articles ☆ The Finger Inside the Mushroom … ☆ Captain Pravin Raghuvanshi, NM ☆

Captain Pravin Raghuvanshi, NM

(Captain Pravin Raghuvanshi —an ex Naval Officer, possesses a multifaceted personality. He served as a Senior Advisor in prestigious Supercomputer organisation C-DAC, Pune. He was involved in various Artificial Intelligence and High-Performance Computing projects of national and international repute. He has got a long experience in the field of ‘Natural Language Processing’, especially, in the domain of Machine Translation. He has taken the mantle of translating the timeless beauties of Indian literature upon himself so that it reaches across the globe. He has also undertaken translation work for Shri Narendra Modi, the Hon’ble Prime Minister of India, which was highly appreciated by him. He is also a member of ‘Bombay Film Writer Association’.

? ~ The Finger Inside the Mushroom… ??

There was a time in the Navy when ships were not merely maintained—they were loved immensely.

The young officers of today, raised on modern deck coatings, power tools, and sophisticated maintenance systems, may find it difficult to believe that we once spent hours on our knees, holystoning decks until they gleamed like polished marble.

For the uninitiated, a holystone was a block of soft sandstone used to scrub wooden decks. The task required sailors and young officers alike to kneel and push the stone back and forth along the grain of the deck. By the end of the exercise, backs ached, knees protested, and uniforms were soaked, but the deck shone with a pride that no machine could replicate.

As Cadets onboard INS Mysore, we did it all.

We holystoned the quarterdeck.

We chipped the decks and removed the rust.

We painted ship’s sides while suspended precariously over the water on planks and bosun’s chairs.

We cleaned compartments that no visitor would ever see.

We even cleaned the insides of mushroom ventilators on deck.

At that age, many of us wondered why.

After all, weren’t officers supposed to command?

Years later, the wisdom became apparent.

The Navy was not teaching us how to scrub a deck.

It was teaching us how to inspect one.

It was teaching us that no officer can effectively supervise a task he has never performed himself.

Once you have chipped rust with your own hands, nobody can convince you that rust hidden beneath paint is acceptable.

Once you have cleaned a mushroom ventilator, nobody can claim it has been cleaned when it hasn’t.

And that lesson remained with us throughout our careers.

One incident remains etched in my memory.

Our ship was preparing for the Annual Inspection by the Commander-in-Chief.

As always, preparations were meticulous.

Every compartment was shining.

Every deck was scrubbed.

Every corner was checked.

The ship looked immaculate.

The Commander-in-Chief arrived and began his rounds.

He inspected quietly and methodically.

Then he stopped beside a mushroom ventilator.

Perhaps he had seen enough ships in his career to know where dust liked to hide.

Perhaps he expected to discover what generations of inspecting officers had discovered before him.

Unexpectedly, without a word, he inserted a finger deep inside the mushroom.

For a brief moment, the collective pulse rate of many officers undoubtedly increased as their hearts started pumping faster.

Then he withdrew his finger. Lo and behold! It was:

Clean.

Spotlessly clean.

No dust.

No grime.

Nothing.

The Commander-in-Chief looked at his finger.

Then at the ship.

Then at us.

What he had hoped to find was absent.

What he found instead was evidence of something far more important.

Attention to detail.

Professional pride.

Ownership.

He later complimented the ship, but what remained etched in our memory was the naval equivalent of a standing ovation.

What followed from the Commander-in-Chief was a “Bravo Zulu”—the proverbial “Well Done”.

For those unfamiliar with naval parlance, Bravo Zulu is more than a signal. It is recognition from one seaman to another that the job has been done properly, thoroughly and professionally.

To us, it was not merely praise for a clean mushroom ventilator.

It was recognition of countless hours spent holystoning decks, chipping rust, painting ship’s sides, cleaning hidden corners and learning that excellence lies in the details nobody notices.

The mushroom ventilator was never the point.

The culture was.

And on that day, the culture earned a Bravo Zulu.

And, thereafter, we had:

Fair Winds and Following Seas!

~~xx~~

© Captain (IN) Pravin Raghuvanshi, NM Retd

A Veteran

Pune

≈ Founder Editor – Shri Hemant Bawankar/Editor (English) – Captain Pravin Raghuvanshi, NM ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ आलेख # २९० ☆ पुरुषोत्तम मास : आत्मशुद्धि, प्रकृति-साधना और पुण्य का पावन काल… ☆ श्रीमती छाया सक्सेना ‘प्रभु’ ☆

श्रीमती छाया सक्सेना ‘प्रभु’

(ई-अभिव्यक्ति में संस्कारधानी की सुप्रसिद्ध साहित्यकार श्रीमती छाया सक्सेना ‘प्रभु’ जी द्वारा “व्यंग्य से सीखें और सिखाएं” शीर्षक से साप्ताहिक स्तम्भ प्रारम्भ करने के लिए हार्दिक आभार। आप अविचल प्रभा मासिक ई पत्रिका की  प्रधान सम्पादक हैं। कई साहित्यिक संस्थाओं के महत्वपूर्ण पदों पर सुशोभित हैं तथा कई पुरस्कारों/अलंकरणों से पुरस्कृत/अलंकृत हैं। आपके साप्ताहिक स्तम्भ – व्यंग्य से सीखें और सिखाएं  में आज प्रस्तुत है एक विचारणीय रचना पुरुषोत्तम मास : आत्मशुद्धि, प्रकृति-साधना और पुण्य का पावन काल। इस सार्थक रचना के लिए श्रीमती छाया सक्सेना जी की लेखनी को सादर नमन। आप प्रत्येक गुरुवार को श्रीमती छाया सक्सेना जी की रचना को आत्मसात कर सकेंगे।)

☆ साप्ताहिक स्तम्भ – आलेख # २९० ☆

☆ पुरुषोत्तम मास : आत्मशुद्धि, प्रकृति-साधना और पुण्य का पावन काल ☆ श्रीमती छाया सक्सेना ‘प्रभु’

भारतीय संस्कृति में पुरुषोत्तम मास, जिसे अधिक मास भी कहा जाता है, आध्यात्मिक साधना, आत्ममंथन और पुण्य संचय का विशेष अवसर माना गया है। यह अतिरिक्त मास चंद्र और सौर गणना के संतुलन के लिए जोड़ा जाता है तथा भगवान विष्णु को समर्पित होने के कारण “पुरुषोत्तम मास” कहलाता है। धर्मग्रंथों में इस माह को जप, तप, दान, सत्संग और सेवा के लिए अत्यंत शुभ बताया गया है।

भारतीय परंपरा में धर्म केवल मंदिरों और पूजा-पाठ तक सीमित नहीं रहा, बल्कि प्रकृति की रक्षा को भी पुण्यकर्म माना गया है। पंचतत्व—पृथ्वी, जल, अग्नि, वायु और आकाश—से निर्मित इस सृष्टि के प्रति कृतज्ञता व्यक्त करना भी आध्यात्मिक साधना का ही एक रूप है। इसलिए पुरुषोत्तम मास आत्मशुद्धि के साथ-साथ प्रकृति-संरक्षण का भी संदेश देता है।

इस पावन अवधि में वृक्षारोपण, पौधों की सेवा, पक्षियों के लिए जल-पात्र रखना, जलस्रोतों की स्वच्छता, नदी-तालाबों के संरक्षण का संकल्प लेना तथा पर्यावरण के प्रति जागरूकता फैलाना भी श्रेष्ठ सेवा मानी जा सकती है। जब हम एक पौधे को रोपते हैं या किसी जलस्रोत को स्वच्छ रखने का प्रयास करते हैं, तब वह केवल पर्यावरणीय कार्य नहीं होता, बल्कि सृष्टि के प्रति हमारी श्रद्धा का भी परिचायक बनता है।

आज जब प्रकृति अनेक चुनौतियों का सामना कर रही है, तब पुरुषोत्तम मास हमें यह स्मरण कराता है कि ईश्वर की आराधना और प्रकृति की सेवा एक-दूसरे से अलग नहीं हैं। सच्ची भक्ति वही है जो मानव, जीव-जंतु और प्रकृति—सभी के कल्याण का भाव अपने भीतर समेटे। यही भारतीय संस्कृति का मूल संदेश है और यही पुरुषोत्तम मास की वास्तविक सार्थकता भी।

**

©  श्रीमती छाया सक्सेना ‘प्रभु’

माँ नर्मदे नगर, म.न. -12, फेज- 1, बिलहरी, जबलपुर ( म. प्र.) 482020

मो. 7024285788, chhayasaxena2508@gmail.com

संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ ≈

Please share your Post !

Shares