संस्कृत मध्ये अहं म्हणजे मी. अर्थात अहंकार म्हणजे मी पणा. मी करतो तेच बरोबर असा विचार जिथं येतो, तिथं त्या क्षणापासून मीपणा पोसला जाऊ लागतो.
जी व्यक्ती अशी अहंकारी असते ती, स्वतःच्या विचारांना मतांना जास्त महत्त्व देते. इतरांचं मत, विचार किंवा त्या गोष्टीकडं बघण्याचा दृष्टिकोन समजून घेऊ शकत नाही. अशी व्यक्ती दुसऱ्यांना कमी लेखू लागते. कोणालाही न जुमानता आपण करतो तेच बरोबर असं वाटू लागतं. समोरच्या व्यक्तीला किरकोळ मानून त्या व्यक्तीकडं, दुर्लक्ष करणं सुरू होतं. दुसऱ्यांच्या भावनांचा विचार न करण्याची वृत्ती हे एक या मागचं कारण आहे. स्वतः विषयी अभिमान वाटणं हे जसं नैसर्गिक, तशी अहंकार ही देखील नैसर्गिक भावना आहे. स्वतःच्या यशाचा अती गर्व, मी इतरांपेक्षा श्रेष्ठ कसा हे सांगण्याची धडपड या गोष्टीतून ही भावना वाढीस लागते. काही वेळा असुरक्षितता, सतत आपलंच कौतुक व्हावं ही अपेक्षा अशा गोष्टींमुळे ही भावना मोठी होते. कधी कधी संपत्ती, रूप, बुद्धिमत्ता याला कारणीभूत ठरतात; तर कधी नोकरीत, कुटुंबात अधिकारामुळे आलेला गर्व वाढीस लागतो, तट्ट फुगतो आणि अहंकाराच्या फुग्यात रूपांतरित होतो.
आपणच तेवढे हुशार आपल्याला कोणाची गरज नाही मी समर्थ आहे अशा धुंदीत ही माणसं वावरत असतात. स्वतःच्या नजरेत स्वतःला मोठे समजू लागतात. अचानक कधीतरी या माणसांची फजिती होते. कुणालाही न विचारता मोठे मोठे व्यवहार करताना फाजील आत्मविश्वासनं मोठे निर्णय घेतले जातात. हितचिंतकांना बेदखल केले जाते. परंतु हा निर्णय चुकीचा ठरला तर फजिती होऊ शकते मोठे संकट उडवू शकते.
गर्व किंवा अहंकार हा माणसाचा शत्रू आहे. अहंकाराने उद्ध्वस्त झालेल्या माणसांची अनेक उदाहरणं आहेत. अहंकार हा षड्रिपुंपैकी एक रिपू आहे. शक्ती, बुद्धी, संपत्ती, रूप याचा माणसाला अभिमान जरूर असावा पण त्या अभिमानाचं रूपांतर गर्वात किंवा अहंकारात होणार नाही याची काळजी घेणं जरुरीच आहे आणि महत्त्वाचं आहे.
अहंकार कमी करण्याचा प्रयत्न करत राहायला हवा. त्यासाठी अंगी नम्रता हा गुण बाणवायला पाहिजे. नेहमी नम्र राहायला हवं. इतरांचं ऐकून घ्यायला हवं. सतत शिकण्याची वृत्ती ठेवायला हवी. आपली चूक झाली असेल, तर ती मान्य ही करायला हवी. दुसऱ्यांचा वेगळा दृष्टिकोन समजून घेतला तर, आपलीही समज वाढते. अहंपणा कमी करण्यास ही गोष्ट उपयुक्त ठरते.
विजय माझाच होणार, मीच जिंकणार, माझंच बरोबर असा हेका धरू नये. प्रत्येक वादात मीच बरोबर असं होणार नाही. कधी कधी दुसरा जिंकू शकतो, तर कधी समोरच्याचं म्हणणं ऐकून वाट वाद मिटवणं जास्त फायदेशीर ठरतं. असे समोपचारानं वागणं जमलं तर अहंकार कमी होण्यास मदत होते.
“जै जगा धाकुटे होईजे | तै जवळीक माझी ||” असे ज्ञानोबा म्हणतात.
जगाला मी जितका लहान आहे असे वाटेल तितके जग माझ्या जवळ येईल. समाजात मिसळायला, लोकांना आपलंस करायला पाहिजे असेल, तर आपण आधी लहान व्हायला हवं. साधेपणा अंगात असेल तर लोक संपत्ती वाढते. लोकसंग्रह वाढतो. अहंकाराचा लवलेश जिथे नाही तिथे, आपुलकी वाढ वाढते. जवळीक वाढते, स्नेहभाव वाढतो हाच खरा ज्ञानजन्य निरहंकार होय.
शरीराची तसेच मनाची कामं प्रकृतीच्या नियंत्रणाखाली चालतात. पण अहंकाराच्या आधीन गेलेला माणूस स्वतःला सर्व गोष्टींचा कर्ता समजतो. असा माणूस स्वतःला दु:खाच्या खाईत लोटून देतो. हे दु:ख नको असेल तर, भगवद्गीतेच्या तिसऱ्या अध्यायातील हा श्लोक आपण आचरणात आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
महत्वाच्या कामामुळं अनिलला ऑफिसमधून निघायला रात्रीचे नऊ वाजले. धो धो पाऊस होता. त्यात कॅब बुक होत नव्हती. गरजेच्या वेळी कॅब बुक होत नाही हा नेहमीचा अनुभव. चालत निघालेला अनिल छत्री असूनही बसस्टॉपला पोहचेपर्यंत भिजलाच. आधीपासून तिथं एकजण थांबलेला. अर्धा तास झाला तरी एकही बस आली नाही. वाट बघून वैतागलेल्या अनिलनं रिक्षानं जायचं ठरवलं पण चार-पाच रिक्षावाल्यांनी नकार दिला. शेवटी एकजण मीटरपेक्षा शंभर रुपये जास्त देण्याच्या बोलीवर तयार झाला. रात्रीची वेळ, कोसळणारा पाऊस, लाइट गेलेले, जवळपास निर्मनुष्य रस्ता या परिस्थितीचा विचार करून अनिल तयार झाला. परिस्थितीनुसार काही निर्णय घेताना शहाणपण बाजूला ठेवावे लागते. रिक्षात बसल्यावर अनिलनं बसस्टॉपवर उभ्या असलेल्याला हाक मारली.
“हॅलो, चला. पुढच्या स्टॉपला सोडतो. ”
“थँक्स, मी जाईन. ”
“अहो या हो. बराच वेळ थांबलो. एकही बस आली नाही. ” नाही-हो करत तो रिक्षात बसला.
“हॅलो, मी अनिल”
“मी सुनील, थँक्यु सो मच”
“वेलकम, इथं कुठे”
“ऑफिस”सुनील.
“माझीपण कंपनी इथंच आहे. आज जरा निघायला उशीर झाला. ”
“सेम हीयर, नेहमी बाईकवर येतो पण आज… ”
“कुठे राहता? ”अनिलनं विचारलं.
“आनंदनगर, नवीन डी पी रोड”
“अरे वा!! मी पण आनंदनगरला राहतो”अनिल.
“चांगला योगायोग आहे. एक रिक्वेस्ट, मला आनंद नगरला सोडता. रिक्षा भाडं शेयर करू”
“ओफकोर्स सोडतो पण भाडं शेयर वगैरे नको. ”
“अहो.. पण.. ”
“मित्रा, भयाण पाऊस पडतोय. नशिबानं रिक्षा अन सोबत दोन्ही मिळालय. ”
“सो नाईस ऑफ यू”सुनील.
“आनंदनगरला कुठं राहता”
“नील सोसायटी”सुनीलच्या उत्तरावर अनिलनं डोळे विस्फारले आणि मोठमोठ्यानं हसायला लागला. त्याच्या अनपेक्षित वागण्यानं सुनील गोंधळला.
“एकदम हसायला काय झालं. ”
“दुनिया गोलयं. मीसुद्धा नील सोसायटीतच राहतो”
“काय सांगता”सुनील किंचाळला.
“एच बिल्डिंग, फ्लॅट नंबर १५. ”
“मी जी २०. ”
“म्हणजे आपण चक्क शेजारी आणि आपल्याला माहीतच नाही. ”अनिल, सुनील दोघंही मोठ्यानं हसले अन पुढच्या क्षणाला एकदम गप्प झाले. म्हटलं तर साधी बाब पण खोलात जाऊन विचार केला तर…
—
काळाच्या ओघात खूप काही बदललं. सध्या मी, मला, माझं यापलीकडं विचार नसल्यानं जो तो मोबाइलसोबत एकटा. आपसातल्या भेटीगाठी कमी झाल्यात तर काही वर्षांपूर्वी जगण्याचा भाग असलेले ‘शेजारी’ तोंडदेखले राहिलेत. आता परिस्थिती अशी आहे की आसपास कोण राहतं हे देखील माहिती नसतं अन तशी गरजही वाटत नाही. चाळीत, वाड्यात सताड उघडी असलेली मनं आणि दारं आता फ्लॅटसारखीच कायम बंद असतात. प्रायव्हसीच्या नादात ‘सोशल लाईफ’ हळूहळू संपत चाललीये.
सांगतो. जरा वेगळीये. म्हणूनच तर तुम्हाला सांगायचीय. महिनाभरापूर्वीची गोष्ट. लेकीच्या पाच सहा मैत्रिणी आल्या होत्या आमच्या दुकानात.. इंडियन आर्मीसाठी एखादी स्पेशल राखी आहे का हो तुमच्याकडे? त्यातल्या एकीनं विचारलं. मला कन्सेप्ट आवडली. मी लगेच सूरत ला आमच्या सप्लायरला काॅल लावला. त्यालाही कन्सेप्ट आवडली. तिरंगा, आर्मी टँक आणि स्टेनगनधारी वीर जवान असं डिझाईन असणारी तिरंगा राखी आलीये या वर्षी मार्केटमधे.. त्यावर ‘वीर जवान, देश की शान’ असं लिहलंय… लोकांनाही खूप पसंत पडत्येय ही राखी.
लेक खूप मागे लागलीये. तिच्या पाच सहा मैत्रिणींचा ग्रुप जायचाय तिकडे जैसलमेरला. खरं तर काजल राखी घेऊन जायचीये. तीच ती आर्मीवाली राखी. काजलचे आई बाबाही आहेत बरोबर. तिचे बाबा रिटायर्ड कर्नल कृष्णप्रकाश सिन्हा. आर्मीवालं घराणं आहे त्यांचं. प्रत्येक पिढीत एक तरी आर्मीत आहेच. ग्रेट.
तर काय सांगत होतो? परमिशन्स, रिझर्व्हेशन्स वगैरे सगळे सोपस्कार झालेत. माझाच धीर होत नव्हता. काल कर्नलसाहेबांचा फोन आला. “बच्ची की चिंता मत करो, हम है ना! “. मी कशाला नाही म्हणतोय…?
लेक खुष. लेक खुष तर तिचा बाबाही खुष.
आत्ता लेकीचा फोन आला होता. जाम एक्सायटेड होती.
ती काय म्हणाली ते ऐका.. “बाबा, आज सकाळी जेसलमेरला पोचलो. तिथून चाळीस किलोमीटरवर आहे ही चेकपोस्ट. इकडेतिकडे नुसतं वाळवंट. रणरणतं ऊन. चाळीसच्या वर टेम्परेचर. वाळूत रेघ मारावी तसलं तारांचं फेन्सींग. पलीकडे नापाक पाकिस्तान. तिथल्या प्रत्येक गोळीच्या टप्प्यात होतो आम्ही. मोस्ट थ्रिलींग. असं वाटलं स्टेनगन घ्यावी, धडधड फायर करावं आणि Let’s close the matter forever”
“280 किलोमीटरच्या आसपास पसरलेली बाॅर्डर आहे इथली. 150 च्या आसपास चेकपोस्ट. काही ठिकाणी दलदल, चिखल. दिवस, रात्र, ऊन, पाऊस नो एक्स्यूझ. 24×7 चा खरा इथं समजला. ऑलवेज ऑन ड्यूटी.
बाबा मोस्ट शाॅकींग… आम्ही राख्या घेवून गेलेलो. उडालोच. काजलचा भाऊ नाही मोठी बहीण होती तिथं. राखी नाव तिचं. तिच्यासारख्या अजून 399 होत्या तिथं. 400 जणींची बटालियन आहे ही. या बटालियनचं नावच कसलं भारीये. ‘सीमा भवानी’. आम्ही राखीताई आणि तिथल्या काही जणींना औक्षण केलं. राखी बांधली. मिठाई भरवली. दे वेयर व्हेरी हॅप्पी. दुर्गा होती प्रत्येक जण. मर्दानी. प्रहारी. पलीकडच्या बाजूला ओरडून सांगितलंय. ‘चड्डीत रहायचं, नाहीतर… ‘ बाबा, आयुष्यात विसरणार नाही आजचा दिवस… “
तासाभरानं मी कर्नलसाहेबांना फोन लावला. मनापासून थँक्स म्हणलं. ते गहिवरून बोलत होते.
’93 की बात है. कश्मीर में पोस्टींग थी हमारी. अनंतनाग के पास एक सर्च ऑपरेशन चालू था. पंडित के घर को अॅटॅक किया था, मिलिटंटस् ने. आधा घंटा फायरिंग चालू था. दो को मारा. दो भाग गये भौxxके. घर के अंदर घुसे तो सब खत्म हुआ था. पूरी फॅमीली लाल रंग की होली खेल चुकी थी. बेचारा बाप आखरी सास गिन रहा था. कपाट के अंदर तीन साल की बच्ची को छिपाया था. इसे संभालो’ बोल के
वो बाप मर गया. मैं भी बाप हूँ. गोद ले लिया वो नन्हीसी परी को.. वही हमारी बडी बेटी राखी. ‘
शाॅक्ड मी होतो आता. राखीची गोष्ट. मी कधीच ऐकली नव्हती. जो रक्षण करतो तो भाऊ. आता रक्षण करणारी बहिण सुद्धा. राखीचा धागा किती स्ट्राँग आहे, ते समजलं आज. सीमेवरच्या एका तरी ‘जवाना’ला नाहीतर ‘सीमाभवानी’ला राखी पाठवायलाच हवी. वुई केअर, वुई रिस्पेक्ट, वुई सॅल्यूट. हा राखीचा धागाच देश बांधून ठेवतोय. सॅल्यूट इंडियन आर्मी. सलाम नमस्ते! येणाऱ्या
श्रावणातला मनोहारी निसर्ग बघून बालकवी म्हणतात, ‘श्रावण मासी हर्ष मानसी. ’ श्रावणात, केवळ लेखक कवींनाच हर्ष होतो, असे नाही, तर जनसामान्यांच्याही मनात हर्ष दाटून येतो. त्याचं कारण, या महिन्यात अनेक सण, समारंभ, उत्सव येतात. रोजच्या दैनंदिन जीवनातील चाकोरीपेक्षा, काही वेगळं करताना, नवा उत्साह, नवचैतन्य, नवी उर्जा निर्माण होते.
माझ्या लहानपणी मी या सण-समारंभाच्या कहाण्या माझ्या आजीला वाचून दाखवायची. उदा. नागपंचमीची, दिव्याच्या आवसेची, जीवतीची, शीळासप्तमीची. याशिवाय प्रत्येक दिवसाची कहाणी असे. मला वाचायला त्या खूप आवडत. बाहेरच्या सारखे गूढ, अद्भूत वातावरण कहाणीत असे. त्या मनोरंजकही होत्या, तशाच बोधप्रदही असत. प्रत्येक कहाणीतील कथा वेगळी. त्यांची सुरुवात असे, एक आटपाट नगर होतं. तिथे एक गरीब ब्राह्मण. किंवा एक राजा होता. मग त्या कथेत एक वसा सांगितलेला असे. म्हणजे वागण्याचा नियम. वसा करणार्याला सुख मिळे. तो मोडणार्याला दु:ख, संकटे भोगावी लागत. आशा किती तरी कहाण्या. प्रत्येक कहाणीची कथा वेगळी, पण प्रत्येक कहाणीचा शेवट असे, ही साठा उत्तराची कहाणी. पाचा उत्तरी सुफळ सपूर्ण. कहाणी कोणतीही असो, तिचा शेवट याच वाक्याने होत असे.
त्यावेळी मी आजीला विचारायची, ही ‘साठा उत्तराची कहाणी. पाचा उत्तरी सुफळ सपूर्ण’ म्हणजे काय? तिला काही सांगता आले नाही. त्यानंतर मी मोठी होत गेले. खूप काही ऐकलं, वाचलं, पण ‘साठा उत्तरीचं कोडं काही सुटलं नाही. अनेक भाषेच्या अभ्यासकांना, विचारवंतांना, संशोधकांना विचारलं, पण मला काही समाधानकारक उत्तर मिळालं नाही.
शेवटी एक प्रयत्न म्हणून गुगल बाबाला विचारले. त्यांनी सांगितले, ‘साठा उत्तरी म्हणजे, साठ उतारे असलेली कहाणी म्हणजे कथा. ’. ती पाचा उत्तरी म्हणजे, ’ पाच उतार्यात सांगितली. ’ म्हणजे मोठ्ठी लांबलचक कहाणी, थोडक्यात… पाच उतार्यात सांगितली.
‘पाचा उत्तरी सुफळ सपूर्ण’ म्हणजे मोठ्ठी कहाणी ऐकून जे पुण्य, फळ लाभेल, ते, ही थोडक्यात सांगितलेली कहाणी ऐकूनही लाभेल. तोच तत्त्वबोध लहान कहाणी ऐकूनही होईल.
२५ नोव्हेंबर, १९८७. साडे पाच वाजले होते… पहाटेचा अंधार संपत आला होता. रात्री दीड वाजल्यापासून या ठिकाणी अंधारात सापळा रचून, डोळ्यांत तेल घालून बसलो होतो… सर्वांची बोटं ट्रिगरवरच होती. काल संध्याकाळी पक्की खबर आली होती… याच गावात असलेल्या एका घरात अतिरेक्यांनी हत्यारांची मोठी खेप उतरवून घेतलेली आहे. त्यानुसार मी कॅप्टन डी. आर. शर्मांना PATROLING PARTY घेऊन जाऊन खात्री करून घ्यायला पाठवले होते. कॅप्टन शर्मा आणि त्यांचे वीस जवान त्या घराच्या जवळ पोहोचताच, त्यांच्यावर त्या घराजवळ असलेल्या एका मंदिराच्या गच्चीवरून तुफान आणि अचूक गोळीबार झाला! त्यात काही जवान जखमी झाले. कॅप्टन शर्मा तिथून काहीसे मागे आले आणि त्यांनी बटालियन हेडक्वार्टरला संदेश दिला की, ते गाव LTTE अर्थात लिबरेशन टायगर्स ऑफ तमिल ईलमच्या ताब्यात असून त्यांचे संख्याबळ अधिक असून त्यांची हत्यारे आधुनिक आणि प्रभावी आहेत!
मी कॅप्टन शर्मांना तिथेच सुरक्षित जागी थांबून राहण्याचे आदेश दिले आणि निवडक सैनिकांची एक मोठी तुकडी घेऊन घटनास्थळाकडे त्वरीत कूच केले. तिथे पोहोचायला मला रात्रीचा दीड वाजला. कारण अंतर बरेच होते, रस्त्यात जंगल होते, त्यामुळे सावधानतेने जाणे गरजेचे होते.
आम्ही तिथे पोहोचलो तर त्या भागात एकदम स्मशान शांतता होती. त्या घराच्या जवळ एक ट्रक उभा होता. आम्ही त्या घराला वेढा घातला आणि सकाळी उजाडताच कारवाई करण्याची योजना आखली. पण सकाळी साडेपाच पर्यंत काहीही झाले नाही. त्या घरातून काहीही हालचाल झाली नाही. त्या घरात कुणीही नव्हते, हत्यारेही नव्हती. त्यामुळे आम्ही तिथून परतण्याचा निर्णय घेतला… काही अंतर चालतो न चालतो तोच… आमच्यावर तिथून अगदी जवळच असलेल्या जंगलातून जोरदार गोळीबार सुरु झाला. HMG अर्थात हेवी मशीन गन, एके-४७, हातगोळे इत्यादी शस्त्रांनी आमच्या तुकडीवर प्राणघातक हल्ला झाला! पहिल्याच फेरीत आमचे सुमारे दहा बारा जवान धारातीर्थी पडले!
मी कॅप्टन शर्मांना तिथूनच गोळीबाराला उत्तर देण्याचे आदेश देत ज्या जंगलातून हल्ला सुरु होत्या त्याच्या मागच्या बाजूने जाण्याचा निर्णय घेतला… कारण अजून तसे उजाडले नव्हते… आहे त्या अंधाराचा फायदा घेत, थोड्या लांबच्या रस्त्याने जाऊन शत्रूवर मागून प्रहार करण्याची माझी योजना होती. त्यानुसार मी माझ्या वीस सैनिकांना घेऊन निघालो. गोळीबाराचा आवाज येत होता, त्या दिशेने गेलो… एवढ्यात अंधारातून माझ्या छातीवर रायफल टेकवली गेली… मोठा आवाज झाला आणि त्या रायफलमधून सुटलेली एक गोळी माझ्या बरगड्या फोडत छातीत घुसली… तो धातूचा लालबुंद तापलेला गोलाकार गोळा… खोलवर घुसला… मांस जाळत, चिरत! रक्ताची चिळकांडी उसळली… डोळ्यांपुढे अंधारी आली… आई, बाबा, पत्नी डोळ्यांसमोर दिसू लागली… आता त्यांची कधीही भेट होणार नाही! लष्करात आलो तेंव्हाच समजलं होतं… कुठल्या तरी गोळीवर आपले नाव निश्चित लिहून ठेवले गेले असेल तर त्या गोळीला रोखू शकणार नाही कुणीच. आणि तशी गोळी बनली नसेलच तर मात्र मला काहीही होणार नव्हतं. मरण तर काय कुठेही, कसेही येतेच. देशसेवेत आले मरण तर सोन्याहून पिवळे! माझ्या हातातली रायफल गळून पडली त्या प्रहाराने… पण त्याच उजव्या हाताने मी ती माझ्यावर डागली गेलेली रायफल, तिची नळी पकडली आणि जोर लावून माझ्याकडे खेचली… ती रायफल धरणारा दचकून मागे सरला… त्याला कल्पनाच नव्हती की ज्याला आपण छातीत गोळी घातली आहे… तो असं काही करेल! मी वायूवेगाने रायफल पेलली… ट्रिगर दाबला आणि समोरच्याच्या छाताडात एक नव्हे, दोन नव्हे… सलग पाच-सहा गोळ्या मारल्या… त्याच्या तोंडून मोठी किंकाळी आणि शरीरातून रक्ताच्या चिळकांड्या उडाल्या… धूर निघाला! आणि तो धाडकन कोसळून पडला!
आता अतिरेक्यांनी हल्ल्याचा वेग वाढवला तसा मी ही आहे त्या जागेवरून माझ्या तुकडीला जोरजोरात सूचना देत राहिलो.. माझ्या महार रेजिमेंटची युद्ध घोषणा दिली… बोल… हिंदुस्तान की जय! श्रीलंकेत माझ्या भारताचे, हिंदुस्तानचे नाव त्या जंगलात गुंजत राहिले… माझे जवान लढत राहिले… काही वेळाने आपल्या मदतीसाठी आणखी सैनिक तिथे पोहोचले… मी रक्तबंबाळ… घायाळ… घरच्या, घरातल्यांच्या… माझ्या मायभूमीच्या आठवणीत डोळे मिटले… ते कायमचेच! १३ सप्टेंबर २०२६ रोजी ८० वर्षांचा झालो असतो!
आमचे मूळ गाव केरळमधल्या कोट्टयमजवळचे रामपूरम. आमचे कुळ किलीमंगलम नावाचे. वडील शंकरनारायनन आणि आई जानकी पोटासाठी मुंबईत येऊन राहिले आणि इथेच १३ सप्टेंबर, १९४६ रोजी माझा जन्म झाला. माझे शालेय शिक्षण आणि विज्ञान शाखेतील पदवी शिक्षण सायन येथील SIES अर्थात साऊथ इंडियन एज्युकेशन सोसायटीच्या शाळा-महाविद्यालयात झाले. घरची लष्करी पार्श्वभूमी नसतानाही मी देशाच्या सेवेसाठी लष्करात जाण्याचा निर्णय घेतला. आणि The Officers’ Training School, Chennai (जी आता Officers’ Training Academy म्हणून ओळखली जाते) मधून १९७२ या वर्षी लष्करी अधिकारी म्हणून प्रशिक्षित झालो. मला १५, महार रेजिमेंटमध्ये नेमण्यात आले. पुढील आठ वर्षे मी या रेजिमेंटमध्ये राहिलो. आम्हांला भारताच्या ईशान्येकडील राज्यांत देशविरोधी शक्तींचा मुकाबला करण्याची जबाबदारी देण्यात आली होती. ती मी यथाशक्ती पार पाडली. ‘बोलो, हिंदुस्तान की जय! ’ ही आमची युद्ध घोषणा आणि ‘यश सिद्धी’ हे आदर्श वाक्य आहे. मला माझी मातृभाषा मल्याळम तर येत होतीच, पण माझी जन्मभूमी असलेल्या मुंबईची मराठीही अवगत होती आणि… तमिळ सुद्धा! माझे सैनिक मला ‘पारी साहेब’ म्हणत… परमेश्वरन आडनावामुळे असेल बहुदा! लष्करी अधिका-यांनी नेहमी पुढे राहून नेतृत्व करावे, अशा विचारांचा मी होतो… त्यामुळे ईशान्येत अनेक अतिरेकीविरोधी मोहिमांत मी नेहमी आघाडीवरच राहिलो! ‘१५, महार’ मधून मला पुढे ‘५, महार’ मध्ये पाठवले गेले.
श्रीलंका आपला शेजारी देश… केवळ १८. ६ समुद्री मैल किंवा किलोमीटर्सच्या भाषेत ३४. ५ किलोमीटर्स एवढेच अंतर. या देशाशी आपला संबंध अगदी पुराण काळापासूनचा आहे. पुढे तमिळनाडूमधून मोठ्या संख्येने शेतमजूर श्रीलंकेत स्थायिक व्हायला गेले. श्रीलंकेतील बहुसंख्य ‘सिंहली’ समुदाय आणि मूळच्या भारतीय पण आता श्रीलंकेत कित्येक पिढ्यांपासून स्थायिक झालेल्या समुदायामध्ये संघर्ष पेटला. तमिळ लोकांपैकी काहींनी लिबरेशन टायगर्स ऑफ तमिल ईलम अर्थात L. T. T. E. ही सशस्त्र संघटना स्थापन केली आणि श्रीलंका सेनेशी गृहयुद्ध सुरु केले. काही राजकीय उद्दिष्ट लक्षात घेऊन भारताने श्रीलंका आणि तमिळ बंडखोर यांच्यात परस्पर शांतता राखण्यासाठी श्रीलंकेत ‘शांतिसेना’ अर्थात IPKF इंडियन पीस कीपिंग फोर्स’ पाठवायचे ठरवले. ५४ व्या पायदळ डिविजनमध्ये ८, महार रेजिमेंटही या शांतिसेनेचा एक भाग बनली… आणि मला या रेजिमेंटमध्ये जबाबदारी देण्यात आली… मला तमिळ भाषा येत होती ही बाबही लक्षात घेतली गेली असावी… श्रीलंकेत तमिळ भाषिक आहेत.. त्यांच्याशी संवाद साधायला माझ्या भाषा ज्ञानाचा उपयोग झाला!
भारतीय लष्कर जो आदेश देईल तो प्राणपणाने पाळण्याची आपल्या सैनिकांची परंपरा आहे… मी ही याला अपवाद नव्हतो! जो देशाविरोधात, देशाच्या लष्कराच्या विरोधात शस्त्र हाती घेईल… तो आमचा शत्रू हे सैनिकांचे धोरण आणि प्रशिक्षण असते… बाकी राजकीय, धार्मिक, सामाजिक बाबी आम्ही शिपाईगडी ध्यानात घेत नसतो!
आरंभी श्रीलंकेतील तमिळ जनतेने शांतिसेनेचे स्वागत केले. परंतु पुढे दुर्दैवाने त्यांनीच भारतीय लष्करावर हल्ले करायला सुरुवात केली. शेजारी राष्ट्रांपैकी काही राष्ट्रं श्रीलंका लष्कराला तर काही राष्ट्रं तमिळ बंडखोरांना शस्त्रपुरवठा करू लागली. शांतिसेनेचे काम असल्याने सुरुवातीला भारतीय लष्कर युद्धाच्या तयारीनिशी श्रीलंकेत गेलेच नव्हते. त्यामुळे आधुनिक, मोठी शस्त्रे सोबत नेण्याचा प्रश्नच नव्हता… आणि इथेच खरी समस्या उभी राहिली!
परंतु उत्तम प्रशिक्षण, शौर्याच्या जोरावर भारतीय सैनिकांनी तमिळ बंडखोरांवर बाजी उलटवली… परंतु त्यासाठी ११७१ सैनिकांना प्राणार्पण करावे लागले आणि ३५०० पेक्षा अधिक सैनिक जायबंदी झाले!
मला माझ्या शौर्याबद्दल भारताचा सर्वोच्च सैन्य पुरस्कार ‘परमवीर चक्र’ मरणोत्तर जाहीर करण्यात आला. परकीय भूमीवर भारतीय सैन्यातून कामगिरी करीत असताना एखाद्या सैनिकास दिले गेलेले हे तसे पहिलेच ‘परमवीर चक्र’! १९६१ मध्ये कांगो देशातील कटंगा येथे संयुक्त राष्ट संघाच्या आंतरराष्ट्रीय सैनिकांचा समावेश असलेल्या शांतिसेनेत अतुलनीय पराक्रम गाजवल्याबद्दल कॅप्टन गुरुबचनसिंग सलारिया साहेबांना मरणोत्तर ‘परमवीर चक्र’ प्रदान करण्यात आले होते. आपला देश युद्धात सहभागी नसताना परदेशातल्या युद्धभूमीवर पराक्रम गाजवल्याबद्द्ल ‘परमवीर चक्र’ मिळवणारा केवळ दुसराच सैनिक ठरलो होतो. तसेच ‘परमवीर चक्र’ मिळवलेला OTAचा माजी विद्यार्थी म्हणून मी आजवर एकमेव आहे!
परंतु… पण… त्याचं काय झालं… माझ्या शौर्याची देशात फार काय सुरुवातीला तर अजिबातच चर्चा झाली नाही. कुसुमाग्रजांनी नेमकं म्हणून ठेवलं आहे… स्तंभ तिथे ना कुणी बांधला… पेटली न वात!
त्यावेळचं भारतातील राजकीय, सामाजिक वातावरण, आंतरराष्ट्रीय संबंध या व अशा अनेक कारणांमुळे अगदी २०२५ पर्यंत माझ्या किंवा श्रीलंकेत भारतीय सैनिकांनी ‘ऑपरेशन पवन’ (१९८७-१९९०) मध्ये दिलेल्या ११७१ बलिदानांचा अधिकृत स्मृतिदिन कुठे पाळला जात नव्हता! श्रीलंकेत धारातीर्थी पडलेल्या सैनिकांचे, काही अधिका-यांचे मृतदेह भारतात आणले जाऊ शकले नाहीत!
‘परमवीर चक्र’ विजेता म्हणून माझ्या कुटुंबास विशेष आर्थिक लाभही दिला गेला नाही… किंबहुना ‘परमवीर चक्र’ विजेता म्हणून माझे नावही काही फारसे प्रसिद्ध नव्हते! श्रीलंका सरकारने मात्र २००८ मध्ये कोलंबो येथे IPKF Memorial निर्माण केले!
२०१८ मध्ये OTA मधले ३७ सेवानिवृत्त लष्करी अधिकारी-मित्र एकत्र आले. त्यांनी सात लाख रुपयांचा निधी गोळा केला आणि महार रेजिमेंटच्या सैनिक-अधिका-यांनी त्यात एक लाखाची भर घातली आणि माझा ब्राँझ धातूचा पूर्णाकृती पुतळा उभारला… रायफल हाती आहे माझ्या! OTA मधल्या Drill Square ला माझे नाव देण्यात आले आहे. मी याच ठिकाणी इतरांची सरावाची वेळ संपली तरी March-Pastचा सराव करीत असे. त्यावेळी नेमके भारत-पाक युद्ध सुरु झाले होते, काही प्रशिक्षणार्थी प्रशिक्षण सोडून निघूनही गेले… पण मी मात्र माझ्या निर्णयावर ठाम राहिलो! देशासाठी मरण पत्करणे ही एक भावना आहे. मात्र सैनिक युद्धात शत्रूला मारायलाच जात असतात… मरायला नव्हे! परंतु या प्रयत्नांत मरण आलेच तर ते हसत हसत स्वीकारण्याचीही तयारी असते सैनिकांची! अशा सैनिकांच्या बळावरच तर देश टिकून राहतात… देशाच्या सीमा सुरक्षित राहतात! सैनिक होण्यासाठी काही किंमत चुकवावीच लागते… आणि त्याबद्दल सैनिकांची काहीही तक्रार नसते!
२३ जानेवारी, २०२३ रोजी अंदमान-निकोबार मधील एका बेटाचे माझ्या स्मृतिप्रीत्यर्थ ‘रामस्वामी बेट’ असे नामकरण करण्यात आले! मागील वर्षी २५ नोव्हेंबर, २०२५ रोजी दिल्लीतल्या राष्ट्रीय युद्ध स्मारकामध्ये तत्कालीन सैन्यप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी साहेबांनी भारतीय लष्कराच्या वतीने माझ्या आणि ऑपरेशन पवन मध्ये धारातीर्थी पडलेल्या सर्व सैनिकांच्या स्मृतिप्रीत्यर्थ पुष्पचक्र वाहिले! माझी पत्नी लेखिका, कवयित्री श्रीमती उमा परमेश्वरन उपस्थित होती. ही परंपरा आता सुरु राहील! सैनिकांचा राजकारणाशी काहीही संबंध नसतो, ते केवळ पगार मिळतो म्हणून नोकरी करीत नाहीत.. किंबहुना सैन्यातील सेवा ही नोकरी नव्हेच… तो एक करार असतो आत्म्याने देशाशी केलेला… आणि हा करार प्राण देऊनही पाळला जातोच!
(ऑपरेशन पवन मध्ये महाराष्ट्राचे, मराठा लाईट इन्फंट्री, महार रेजिमेंट यांच्या विविध तुकड्यांमधील तसेच अन्य काही विभागातील सुमारे ८५ पेक्षा अधिक सैनिक हुतात्मा झाले. यांपैकी शिपाई प्रभाकर बयाजी पत्रे आणि हवालदार पांडुरंग काकफळे, सुबेदार सीताराम पाटील (गढवाल रायफल्स) यांना मरणोत्तर वीरचक्र पुरस्काराने तर लान्स नायक मिलिंद कांबळे, यांना मरणोत्तर सेना मेडलने सन्मानित करण्यात आले. या यादीत नाईक श्रीधर विठ्ठल कुरणकर(गढवाल रायफल्स) हेही मराठी नाव आढळते ज्यांना मरणोत्तर वीर चक्र आणि सेना मेडल मिळाल्याचा उल्लेख आहे. इंटरनेटवर शहीद उपवन मध्ये ही सर्व नांवे आहेत. असो.
मिळवण्यासाठी किंवा आपल्या शरीरातील जलतत्त्व संतुलित करण्यासाठी व मनाला शांत करण्यासाठी प्रभावी पद्धत आहे. ज्यामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारते. जल ऊर्जा हे निसर्गाशी जोडलेली शांतता आणि भावनांवर नियंत्रण मिळवून देणारी असते.
जल ऊर्जेचे फायदे:
मानसिक शांती:
पाण्या सारखा प्रवाहीपणा आपल्या विचारात येतो. त्या मुळे मनातील गोंधळ कमी होतो. व एकाग्रता वाढण्यास मदत होते.
पाण्यासारखी स्थिरता आणि शांतता मिळण्यास मदत होते.
तणावमुक्ती: मज्जासंस्था शांत होते. आणि मानसिक ताण कमी होतो. ही ऊर्जा स्नायुंमधील ताण कमी करुन शरीराला शिथिल (Relax) करते. त्यामुळे गाढ झोप लागण्यास मदत होते.
सर्जनशीलता:
मन स्पष्ट आणि शांत झाल्यामुळे कल्पकतेत वाढ होते. मनाला नवीन दृष्टी मिळते.
भावनिक समतोल: भावनांचे नियमन करण्यास आणि नकारात्मकता कमी करण्यास मदत होते. जलतत्व हे भावनांशी संबंधित असते. या मुळे राग, भीती, तणाव या सारख्या नकारात्मक भावनांवर नियंत्रण मिळवणे सोपे जाते. आणि मन स्थिर होते.
लवचिकता
पाणी जसे पात्रा प्रमाणे आकार धारण करते त्या प्रमाणे ही ऊर्जा जीवनातील बदल स्वीकारण्याची आणि जुळवून घेण्याची क्षमता वाढवते.
अंतर्मनाची शुद्धी
पाणी जसे अशुद्धी धुवून टाकते, त्या प्रमाणे ही जलऊर्जा मनातील जुन्या नकोशा आठवणी, दुःख, नकारात्मक विचारांचे ओझे स्वच्छ करुन मन हलके करते.
अंतर्ज्ञान
ही ऊर्जा अंतर्ज्ञानाशी (Intuition) जोडलेली असते.
सकारात्मक ऊर्जा वाढणे
या ऊर्जे मुळे शरीरातील ऊर्जा केंद्रे (चक्र) संतुलित होतात.
टीप: हे ध्यान रात्रीच्या वेळी किंवा शांत वातावरणात करणे अधिक फलदायी मानले जाते, जेणेकरून मन अधिक एकाग्र होऊ शकते.
☆ अकाऊंट क्लोज्ड… – लेखक : श्री संजय मानके ☆ प्रस्तुती – वर्षा राजाध्यक्ष☆
☆
संध्याकाळचे सहा वाजले होते. बाल्कनीत बसून हातातला चहाचा कप पेलताना जनार्दनरावांचे डोळे उगाचच शून्यात दाटले होते. नेहमीप्रमाणे मनात विचारांचे वादळ सुरू होते—गेल्या महिन्यात मुलगा-सुनेने स्वतंत्र राहण्याचा घेतलेला निर्णय, काल रस्त्यात भेटूनही न बोलता निघून गेलेला जुना मित्र, आणि दोन वर्षांपूर्वी ज्या नातेवाइकाला अडीअडचणीत मोठी आर्थिक मदत केली त्यानेच नंतर फिरवलेली पाठ!
मी आयुष्यभर लोकांसााठी काय काय नाही केलं? पण बदल्यात मला काय मिळालं? फक्त उपेक्षा आणि अपमान… जनार्दनराव स्वतःशीच पुटपुटले. त्यांच्या छातीत एक ओळखीची जाळणारी व्यथा जागी झाली.
तेवढ्यात दारावरची बेल वाजली. दारात जनार्दनरावांचे जुने स्नेही आणि अभ्यासू लेखक ‘वपु’ उभे होते.
“काय जनार्दन, कसला विचार चालू आहे? चेहरा एवढा पडलेला का? ” वपुंनी आत येत विचारले.
जनार्दनरावांनी उसासा टाकला, “काय सांगू वपु, लोकांच्या वागण्या-बोलण्याचा फार त्रास होतो आजकाल. ज्यांच्यासाठी आयुष्य घासले, तीच माणसे अशी विचित्र वागतात. अपमान करतात, दुर्लक्ष करतात. उपकारांचे विस्मरण झाले आहे सगळ्यांना. “
वपु थोडे हसले. त्यांनी खिशातून एक छोटी वही काढली आणि समोरच्या टेबलावर ठेवत म्हणाले, “जनार्दन, एक सांगू? आपण या जन्मात येतो ते कोणाच्या अपेक्षा पूर्ण करायला नाही, तर आधीच्या कुठल्यातरी जन्माची परतफेड करायला! आपण प्रत्येकाचे मनात एक ‘खाते’ उघडून बसलोय. आणि समोरच्याने आपल्या इच्छेनुसार वागावे, अशी अपेक्षा ठेवतो. “
“पण वपु, त्रास तर होतोच ना? ” जनार्दनराव काकुळतीला येऊन म्हणाले.
“त्रास तेव्हाच होतो, जेव्हा आपण ते खाते अजून चालू आहे असे मानतो, ” वपु शांतपणे समजावून सांगू लागले, “तुम्ही दृष्टिकोन बदला. मुलगा आणि सून तुमच्याशी बोलत नाहीत? समजा, एखादी जुनी परतफेड होती, ती या जन्मात पूर्ण झाली. तुमच्या उपकारांची कोणाला आठवण राहिली नाही? समजा, ते खाते आता पूर्ण झाले. बँकेत शिल्लक संपली की पासबुकावर कसा ‘अकाऊंट क्लोज्ड’चा शिक्का मारतात? बस, तसेच मनातल्या या माणसांच्या नावावर ‘अकाऊंट क्लोज्ड’चा शिक्का मारा आणि त्यांच्या नावाचे पासबुक जाळून टाका! “
जनार्दनराव थबकले. वपुंचे शब्द थेट त्यांच्या मनाचा ठाव घेत होते.
वपु पुढे म्हणाले, “आपले मन जेवढे बलदंड असते ना जनार्दन, तेवढेच ते लवचीकही असते. आजवर तुम्ही मनाच्या हुकुमात राहिलात, त्याच्या भावनांची गुलामी केलीत. आता त्या मनाला सांगा—’बाबा रे, आजपासून मी तुला मुक्त करत आहे. ‘ परतफेडीचा हिशेब या जन्मात संपवल्याशिवाय सुटका नाही. मग कशाला विचारता परमेश्वराला की मला का जगवलंस? जे घडतंय, ती केवळ परतफेड आहे, हे स्वीकारा. “
जनार्दनरावांनी डोळे मिटले. मनातल्या गच्च साचलेल्या आठवणींकडे ते एका वेगळ्या नजरेने पाहू लागले. मुलगा दूर गेला—’अकाऊंट क्लोज्ड! ‘ मित्राने दुर्लक्ष केले—’अकाऊंट क्लोज्ड! ‘ नातेवाइकाने फसवले—’अकाऊंट क्लोज्ड! ‘
आश्चर्य म्हणजे, एकेक खाते बंद झाल्याची भावना मनात येताच, छातीत वर्षानुवर्षे साचलेला तो जाळणारा भार हळूहळू हलका होऊ लागला.
वपु उठले, त्यांनी जनार्दनरावांच्या खांद्यावर हात ठेवला आणि मिश्किलपणे म्हणाले, “हा प्रयोग करून बघा जनार्दन, आणि किती खाती फटाफट बंद होतात याची प्रचिती घ्या. अगदी उद्या मीसुद्धा तुम्हाला रस्त्यात भेटलो आणि ओळख दाखवली नाही, तर तुमच्या पासबुकात माझी एकच एन्ट्री होती, असं समजा आणि माझी फाइलही बंद करा! “
वपु निघून गेले. जनार्दनराव पुन्हा बाल्कनीत येऊन उभे राहिले. आता संध्याकाळचा वारा त्यांना शांतवत होता. मनात दुःखाची किंवा रागाची कोणतीही भावना शिल्लक नव्हती.
अनेक वर्षांनंतर आज जनार्दनरावांनी एक दीर्घ, मोकळा श्वास घेतला. कारण, त्यांच्या मनातील नकारात्मकतेची सर्व पासबुके आज खरोखरच जळून खाक झाली होती!
☆
लेखक: श्री संजय मानके
प्रस्तुती: वर्षा राजाध्यक्ष
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈