☆ “जीवन’संपदा’ नष्ट करणाऱ्या संवेदनाहीनतेचे जाळे”☆ श्री संभाजी बबन गायके ☆
मानवी जीवनाला सर्वोच्च प्राधान्य या तत्वावरच मानवी समाजाची रचना झाली आहे… आणि त्यानुसारच कार्यपद्धतीही निश्चित करण्यात आली आहे. किंबहुना ती तशीच होणे अपेक्षित आहे. मृत्यू अटळ असला तरी तो नैसर्गिकपणे आला तरच त्याला अर्थ असतो. बाकी सर्व मृत्यू ‘बळी’ या प्रकारात मोडतात!
घरोघरी वीजपुरवठा, इंटरनेट, टेलीविजन वाहिन्या इत्यादी सुविधांसाठी वायर्स, केबल्स, पाईप्स वापरणे गरजेचेच असते. यात या केबल्स इत्यादी इकडून तिकडे ‘फिरवणे’ क्रमप्राप्त असतेच. वीजपुरवठा केबल्स भूमिगत टाकता येतात. पण इतर केबल्सचे तसे नाही. एक इमारत ते दुसरी इमारत, मध्ये असणारी झाडे, विजेचे खांब इत्यादीवरून या केबल्स दुसरीकडे नेताना त्या खाली अधांतरी लोंबकळत राहणार हे निश्चित. वादळ, मानवी हस्तक्षेप, केबल्स खराब होऊन तुटून जाणे, चोरी करण्यासाठी केबल्स कापून नेणे व उरलेली केबल तशीच ठेवणे, यांमुळे या केबल्स खाली येतात. काही ठिकाणी या केबल्सच्या गुंडाळ्या करून बाजूला लटकत ठेवल्या जातात, चोर केबल कापून उरलेली केबल तशीच लटकवत ठेवून जातात, आणि या केबल्स जर लोकांच्या जाण्या-येण्याच्या मार्गात असतील तर त्या त्वरीत तिथून दूर करणे अनिवार्य असते. पण नेमकी हीच बाब दुर्लक्षित राहिल्याचे दिसते. कारण कुणाच्या जीवाचे कुणाला काही सोयरसुतक राहिलेले आहे, असे अजिबात आढळत नाही. आग लागलेली ज्याला दिसते त्याने त्याचक्षणी बोंब ठोकत इतरांना सावध करणे, सूचना देणे जसे केले जाते, तसे या बाबतीत केले जात नाही. काहीजणांना हा धोकाच लक्षात येत नाही. केबल्स यंत्रणा राबवणा-या लोकांच्या लक्षात आणून दिले तर लगेचच हालचाल होईलच असेही नाही. हा सर्वस्वी दोष आपल्या समाजव्यवस्थेचा, प्रशासनाचा आहे.
कायद्याच्या भाषेत सदोष मनुष्यवध हा प्रकार असतो. भारतीय दंड (शिक्षा) संहितेच्या १००/१०१ कलमानुसार साधारणत: अशी परिभाषा आहे की, एखाद्याच्या एखाद्या कृतीने, मनुष्याचा मृत्यू ओढवू शकतो, याची कल्पना असतानाही त्याबाबत योग्य ती काळजी न घेतली जाणे याला त्या व्यक्तीला, संस्थेला जबाबदार धरले जाईल. यासाठी १० वर्षे ते आजन्म कारावास आणि आर्थिक दंडाची तरतूद आहे. या प्रकारच्या घटनांमध्ये झालेला मृत्यू ‘वध’ म्हटले गेले आहे, यातच सगळे आले!
या कायद्याची अंमलबजावणी कटाक्षाने झाली तरच इतरांना जरब बसेल. परंतू आपल्याकडील मानसिकता, पळवाटा असणारे कायदे, लपवण्याची, फसवण्याची कला अवगत असणारे तज्ज्ञ, आर्थिक हितसंबंध, राजकीय हेवेदावे यांत सर्व जिरून जाते… आणि हवेत विरूनही जाते.
खड्डे खोदून ठेवले जातात, त्यांच्या भोवती संरक्षक व्यवस्था ठेवण्याची तसदी घेतली जात नाही, अंधारात माणसे या खड्ड्यात कोसळतात. शेतात शेततळी तयार होतात, तिथेही हीच त-हा. पतंग उडवण्यासाठी वापरला जाणारा मांजा चीन मधून येतो आणि चिनी आपल्या लोकांचा युद्धाशिवाय बळी घेऊ शकतात आणि त्यांना हा नायलान धागा मांजा म्हणून नालायक व्यापारी साहाय्य करतात. वाहने विरुद्ध दिशेने चालवून, अतिशय बेदरकारपणे चालवून, चीनी हेडलाईट्स लावून समोरच्याला तात्पुरते आंधळे करून जाणारे, वाहने रिवर्स घेताना, पार्क करताना त्यांच्याखाली कुणी मनुष्य, प्राणी नाही न हे पाहण्याची काळजी न घेणारे, बांधकामाच्या ठिकाणी वाळूत एखाद्या कष्टकरी महिलेचे लेकरू निजवले गेले असू शकते याचा विचार मनातही न आणणारे चालक, एकमेकांशी समांतर वाहने चालवत बोलत चाललेले वाहनचालक… मरणासाठी ही अशी हजारो कारणे आहेत. आणि या मरणांना आपण कारणीभूत होऊ शकतो, याची तिळमात्र शक्यता मनात नसणारी माणसेही लाखो आहेत. जगायचे कसे?
स्वत:च्या चुकीमुळे स्वत:चाच अपघातात मृत्यू झाला आहे, अशा व्यक्तीवर सुरुवातीला एफ. आय. आर. दाखल होतो! पण मृत व्यक्तीला शिक्षा देता येत नसल्याने हा गुन्हा रद्दही केला जातो. पण यासाठी न्यायिक प्रक्रिया असल्याचे ऐकण्यात आले आहे. पण जे इतरांच्या मृत्यूस कारणीभूत आहेत, अशांवरही ही प्रक्रिया लागू असते. परंतू हे खटले खूप प्रलंबित राहतात, हे दुर्दैव आहे… अफाट लोकसंख्या हे कारण तर आहेच पण त्यापेक्षाही राजकीय, सामाजिक इच्छाशक्तीचा अभाव हेही सर्वांत मोठे कारण आहे… जीव महत्त्वाचा मानला तर सर्वकाही करणे शक्य आहे… पण असो.
त्याला काय होतंय, मला काय त्याचं आणि हे असंच चालायचं अशी सार्वत्रिक वृत्ती बळावल्याने आपण आपली जीवन संपदा गमावण्याच्या अगदी जवळ असतो… हे सत्य आहे. फक्त तू आधी की मी आधी? एवढाच काय तो प्रश्न उरतो. कधी न कधी मरायचेच आहे, ज्याचे दिवस भरले तो जातो, आपण काय करणार? देव माणसाच्या मृत्यूला स्वत: जबाबदार राहू नये म्हणून अशाच काही सबबी शोधतो असेही लोक बोलतात. एक व्यक्ती जेंव्हा अशी अचानक, विनाकारण, दोष नसताना या जगातून जाते अर्थात तिला जावेच लागते… तेंव्हा अनेकांवर अनेक संकटे ओढवतात… ही यादी मोठी आहे!
त्यामुळे जे आता जिवंत आहेत, त्यांनी आपणही किंवा आपलेही कुणी यात केंव्हा तरी सापडू शकते, अशा विचाराने, एखादी आग लागली की आपण जसे धावत सुटतो, त्या पध्दतीने काही उपाय केले तरच हे थांबेल. अन्यथा… आपल्या कर्माची फळे भोगायला वर जाण्याची हल्ली गरज नाही… इथंच सर्व व्यवस्था आहे!
माझ्या मित्राची पत्नी, संपदा संदीप पटवर्धन अशाच एका केबल जाळ्यात अडकून जीवाला मुकली. त्यानिमित्ताने हे मनातले लिहिले आहे. विसरून जाऊ नका. कारण संपदाच्या वधाचा दोष आपल्याही माथी आहेच. पुढे असे आणखी पाप आपल्या हातून घडू नये, ही अपेक्षा आहे.
काळे आजींना भेटायला मी जात असते. काका गेले तेव्हापासून आजी जरा नरम गरम असतात. रात्री सोबतीला एक बाई झोपायला येते. दिवसा दोन बायका येऊन जाऊन कामाला येत असतात. त्यांना एकच मुलगी आहे. ती जवळच राहते. त्या तिला तायडी म्हणतात. ती दिवसातून एकदा तरी येऊन जाते.
खरंतर आईला तिच्या घरी घेऊन जायला ती तयार आहे. जावई पण “या माझ्याकडे रहायला” म्हणतो आहे. पण त्या म्हणतात “अजून मला होत आहे तोपर्यंत मी एकटी राहते. नंतर तुमच्याकडेच येणार… “
मला एकदा म्हणाल्या, “अगं असं लेकीच्या सासरी नको वाटतं ग.. मी गेले की त्यांचं सगळं आयुष्य बदलेल.. “
आजी शहाण्या आणि समंजस आहेत.
अशीच त्या दिवशी आजींकडे गेले. खुर्चीवर बसणार तर त्या म्हणाल्या, “अग नीता, आधी इथं माझ्याजवळ कॉटवर ये. “
गेले…
माझा हात हातात घेऊन म्हणाल्या, “अगं किती सुरेख हिरव्या बांगड्या घातल्या आहेस… घालाव्या ग.. बघायला किती छान वाटतंय बघ बरं… “
आजींना खरं ते सांगितलं. म्हटलं.. “काल कपाट आवरताना दिसल्या म्हणून अशाच घातल्या. हल्ली रोज काचेच्या बांगड्या घालते असं नाही. “
“तुला सांगु, मला तर हिरव्या बांगड्या फार आवडायच्या… “
“आवडायच्या म्हणजे.. आता नाही आवडत?”
“अग असं काय विचारतेस?
हे गेले.. आता कुठलं हिरव्या बांगड्या घालणं नशीबात… “
“पण हिरव्या बांगड्यांचा आणि काकांचा काय संबंध?”
“मी काय म्हणते तुला समजलं नाही. “
“कळलं मला… तुम्ही लग्नाआधी हिरव्या बांगड्या घालत होता?”
“हो… “
“मग तेव्हा कुठे काका होते?”
“अग पण ते वेगळं… “
“वेगळं कसं?”
“अग सवाष्णीच लेणं.. मी कसं घालू?” हे बोलताना आजींचे डोळे भरून आले होते..
“थांबा, तुम्हाला सांगते… आत्मा अमर आहे. मृत्युनंतर शरीर नष्ट होते पण आत्मा मरत नाही. आवडत्या व्यक्तीभोवती तो फिरत असतो… त्याचं काय चाललं आहे ते बघत असतो. हे आपण वाचलं आहे की नाही?… “
“हो… मग त्याचा ईथं काय संबंध… “
तुमची तायडी, तिची मुलं.. मार्गाला लागली आहेत. आता काकांचा आत्मा दुसरीकडे नाही तर तुमच्या भोवतीच फिरत असणार.. तुम्ही हिरव्या बांगड्या घातल्या तर काकांच्या आत्म्याला आनंदच होईल.. तुमचा आनंद तोच त्यांचा आनंद… “
“अगं पण समाजाचं काय?”
“कुठला समाज?” असं म्हटल्यावर त्या विचारात पडल्या.
म्हटलं, “तुम्हाला भेटायला येणारे लोक हा समाज? त्यांचं तुमच्या हाताकडे लक्ष तरी असतं का?”
“हो ग… तू म्हणतेस ते पटतंय बघ.. आणि आजकाल फारसं कोणी घरी येत ही नाही. त्यांचंही बरोबर आहे.. प्रत्येकजण आपापल्या नादात.. ज्याला त्याला आपला संसार, नोकरीधंदा आहे, त्यांना कामही असतात ग.. “
सत्य आहे ते आजींनी स्वीकारलं होतं. हे सांगताना त्यांचा आवाज शांत होता. हळुवारपणे त्यांचा हात हातात घेऊन त्यांना सांगितलं… “घालावीशी वाटते ना हिरवी बांगडी, तर घाला.. “
“नको ग नको… ” आजी अगदी घाईने म्हणाल्या…
“आहेत का तुमच्याकडे?”
“हो समोरच्या कपाटात डबा आहे, त्यात आहेत. “
मी डबा आणून दिला. त्यातल्या हिरव्या बांगड्या काढून हातात घेऊन त्या बसल्या होत्या. डोळे भरून आले होते…
संस्कारांच्या दबावाचा एक खोल ठसा वर्षानुवर्ष मनावर कोरलेला असल्याने त्यांना बांगड्या घालायचे धैर्य झाले नाही.. रूढी परंपरा मोडणं इतकं सोपं नसतंच…
त्याची मूळं मनात खोल घट्ट रुतून बसलेली असतात…
“राहू दे.. नकोच… ” असं म्हणत त्यांनी हळूच बांगड्या डब्यात ठेवून दिल्या.
निघताना त्यांनी परत माझे हात हातात घेतले.. माझ्या पोटात तुटत होते.. डोळे भरून आले होते.. घरी आले तरी आजीच दिसत होत्या…
मध्यंतरी एका लग्नघरी बांगड्या भरायचा कार्यक्रम होता. तिथे कासारीणबाई सहजपणे म्हणाल्या,
“या हिरव्या रंगाच्या बऱ्याच प्रकारच्या बांगड्या आणलेल्या आहेत. आणि “तशा” बायकांसाठी या ईतर रंगाच्या पण आहेत… “
म्हणजे बदल करायचं मनात असेल तरीसुद्धा… समाज तुम्हाला त्या रुढीची आठवण करून देत राहतो. हे असे विचार लगेच पुसले जातच नाहीत…
आठ दिवसांनी आजींचा फोन आला. “नीता भेटायला येशील का… ”
गेले… बांगड्यांचा डबा उशी जवळ होता.
“ये ग ये… तुझीच वाट पहात होते… “
त्या लगेच सांगायला लागल्या.. “तू सांगितलेल्या गोष्टींवर मी विचार केला, मग पटलं मला… तु म्हणतेस ते खरं आहे… आता मी काय गंमत करते माहित आहे? कोणी नसलं की मी बांगड्या हातात घालते… अगं पहिल्यांदा घातल्या तेव्हा तर इतका आनंद झाला म्हणून सांगू?लग्नाचा चुडाच आठवला… ” हे सांगताना त्यांचे डोळे चमकत होते…
पुढे म्हणाल्या, “आता मनात आलं की घालते… पण कोणी नसताना… परवा तर काय झालं… तायडी लॅचकीनी दार ऊघडून आली की अचानक, आणि हातात बांगड्या तशाच… पण तिचं माझ्या हातांकडे लक्ष गेलंच नाही, चांगली दोन तास होती… “
“बघा, मी तुम्हाला म्हटलं होतं की नाही?”
“हो ग… “
“आज तुला घालून दाखवते. “
आजींनी आठ-आठ बांगड्या हातात घालून हात पुढे केला…
अपार आनंद चेहऱ्यावर होता.. आज आजींचे डोळे हसत होते…
त्यांचे सुरकुतलेले हात मी हातात घेतले… म्हटलं, “आज काकांचा आत्माही हसत असेल… बायकोला खुष बघून… “
असा सहज ओसंडून वाहणारा आनंद कुणाच्या चेहऱ्यावर दिसला की मी समाधानी असते… असा निरपेक्ष आनंद वाटत राहावा…
खरं सांगू… त्यासाठी खूप काही करावं लागत नाही…
एके दिवशी तायडी माझ्यासाठी डझनभर हिरव्या बांगड्या घेऊन आली… “नीता मावशी… ” म्हणताना तिचे डोळे भरून वहात होते… “अग आता आईला बांगड्यांच्या नादच लागला आहे.. त्यामुळे हल्ली आई खूप आनंदात असते… ”
सध्या नागपूर मध्ये सहायक राज्यकर आयुक्त (Assistant Commissioner of State Taxes)
वाचनाची लिखाणाची आवड. ललित लेखन, कविता तसेच सामाजिक विषयावर लिखाण करायला आवडते. लोकप्रभा, तरुण भारत, देशोन्नती, मातृ सत्ता व जन्मंगळ मधून लेख प्रकाशित झाले. नुकतच ‘मनातलं’ हा ललित लेखांचा संग्रह प्रकाशित.
पुत्र व्हावा ऐसा चित्रपटातील पी सावळाराम यांचे गीत ऐकता ऐकता सुखदा आपला मुलगा सुशील याचे सायकल शिकणे आनंदाने पहात होती. सुशील अंगणात सायकल चालवायला शिकत होता. पहिल्यांदा हाफ पॅडलिंग करता करता दमून गेला. नंतर सीटवर बसण्याचा प्रयत्न करताना दोनदा तीनदा आपटला. हाताला लागलं, कपडे तर मातीत घोळून निघाले. पण तरीही जिद्दीने तो स्वतः सीटवर बसून पूर्ण पॅडलिंग करत सायकल चालवायला शिकला. तेव्हा त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहण्यासारखा होता. त्याच्या चेहऱ्यावरचे तेज पाहून सूर्य सुद्धा थोडा ओशाळा झाला असेल.
अतिशयोक्तीचा भाग सोडला तर खरंच कष्टानंतर मिळालेल्या यशाचे वर्णन कितीही केले तरी कमीच असते. खरंच यश हे अमृत झालेले असते आणि त्या यशासाठी घेतलेले दुःख, झालेल्या यातना या सुद्धा सुखात परावर्तीत होतात.
त्या सुखात नकळत अजून चांगल्या गोष्टी कशा दडलेल्या असतात, तर सुशील आनंदात घरात आला. त्याने इकडे तिकडे पाहिले आणि हळूच कोणी नाही पाहून प्रथम बाथरूम गाठले. आपले कपडे पाहून आई रागवेल असे वाटून स्वतःचे कपडे स्वतः धुतले. स्वच्छ आंघोळही केली.
आई सुखदाने सगळे पाहिले होते. त्यामुळे तिने तेल हळद तयार ठेऊन खरचटलेल्या जागेवर ते लावले. लगेच गरम दूध प्यायला देऊन बेसनाचा लाडू पण दिला. आनंदाने जेव्हा सुशिलने आई आता मला सायकल येते हे सांगितले तेव्हा सुखदाने त्याला शाब्बासकी दिली. म्हणाली खरंच खूप आनंद होतोय. पण यशाहुनीही प्रयत्न सुंदर असतात बाळा.
बघ तू पडलास, तुला लागलं तरी तू प्रयत्न सोडले नाहीस जिद्द पक्की केलीस माघार घेतली नाहीस म्हणूनच तुला सायकल तर आलीच. पण आईच्या कामाची जाण येऊन तुला तुझे कपडे धुण्याइतके स्वावलंबी केले. तुला स्वच्छतेचे महत्व वाटून तुला कोणी न सांगताही आंघोळही केलीस.
जीवनातही असेच असते. भिंतीवर तोंडात खाऊ घेऊन जाणारी मुंगी पण खाली खाली घसरते, कधी पडते पण वर जाण्याची जिद्द धरून ती वर जातेच. एडिसनने हजार वेळा प्रयोग करून मग 1001 व्या वेळी ब्लबचा शोध लागला. त्यावेळी त्याच्या मुलाखतीत तो म्हणाला होता की काय केले नाही तर ब्लब लागतो हे मी वेगवेगळ्या हजार मार्गानी शिकलो. अपयश हे आपल्याला अनुभव देत असते आणि तोच मोठा गुरू होउन आपल्याला ज्ञानी करत असते.
सोहनलाल द्विवेदी यांची लहरों से डर कर नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती। ही कविता आपल्याला एक सकारात्मकता देते.
म्हणूनच यशाचा सागर पार करायचा असेल तर प्रयत्नांच्या बेटांवर विसावायला हवं. ती बेटे कदाचित पैलतीरापेक्षा अधिक सुंदर असतात.
परवाच एक जण अतिशय निराश होउन बसला होता. कारण upsc परिक्षा सलग तिसऱ्यांदा अगदी थोड्या मार्कांने नापास झाला होता. म्हणाला अपयश ही यशाची पहिली पायरी असते हे माहित होते पण येथे तर जीनाच तयार होताना दिसतोय. पण बाळा हे सुद्धा काही खोटे नसते. प्रत्येकवेळी जरी अपयश आले असे वाटत असले तरी तुम्ही यशाच्या कडे अजून थोडे पुढे गेलेला असता. यशाच्या शिखरावर जायला पायऱ्या चढयलाच हव्या. हेलिकॅप्टरने यश शिखरावर उतरणे याला काही अर्थ नसतो. तुम्ही तो जीना नजरेपुढे आणा. पहिली पायरी अपयश, दुसरी पायरी अपयश +निर्धार, तिसरी पायरी अपयश +निर्धार+प्रयत्न, चौथी पायरी अपयश +निर्धार+प्रयत्न +कष्ट, पाचवी पायरी अपयश +निर्धार+प्रयत्न +कष्ट+सातत्य, सहावी पायरी अपयश +निर्धार+प्रयत्न +कष्ट+सातत्य +सराव, सातवी पायरी अपयश +निर्धार+प्रयत्न +कष्ट+सातत्य +सराव+आत्मविश्वास, मग सातव्या पायरीनंतर यश तुमचेच असते. याचा अर्थ अपयशा नंतरपुन्हा तुम्ही तितकी अपयशे पचवण्याची मानसिकता ठेवली पाहिजे असा नाही. तर तुम्ही बाकीच्या सगळ्या पायऱ्या एका दमात सुद्धा चढू शकता आणि पुढच्या वेळेस लगेच यश मिळेलही. पण जर लगेच यश नाहीच मिळाले तर त्याने नाराज होउन प्रयत्न सोडून देण्या पेक्षा पुन्हा पुन्हा प्रयत्न करत राहिले तर यश मिळणारंच हा आत्मविश्वास हवा.
हा वेदनेचा स्पर्श होत प्रकटलेला भावनांचा आवेगी ओघ आहे; जो…
विश्व कवी, कवी गुरू, गुरूदेव रविंद्रनाथ टागोर यांनी, आपल्या प्रिय पत्नीच्या निधनानंतर स्मरण या काव्यसंग्रहात प्रसृत करत ; प्रवाहित केला… स्मृती सुमन रुपात!!
रवींद्रनाथांच्या वडिलांच्या टागोर इस्टेट मध्ये व्यवस्थापक असलेल्या बेनीमाधव यांची कन्या… भवतारिणी रविंद्रनाथांची पत्नी म्हणून आली त्यावेळी तिचं वय होतं ९ वर्षे… आणि रविंद्रनाथांचं वय होतं २२. लग्नानंतर तिचं नाव बदलून मृणालिनी ठेवण्यात आलं. अतिशय साध्या, ग्रामीण भागातून आलेली ही निरक्षर बालिका! एक नाजूक वेल… जी एका विराट वृक्षाच्या छायेत… त्याच्या आधारावर जगू पहाणारी.
पण तिचं भाग्य थोर की, विवाहानंतर घरचीच कामं केली पाहिजेत अशी कुणीही जबरदस्ती नाही केली. स्वतः रवींद्रनाथांनी तिला लोरे टे हाऊस या शाळेत इंग्रजी भाषा शिकायला पाठवले. पाटी-पुस्तक, गणवेश ते दाखला काढणे, हे सगळं केलं. संस्कृत भाषा शिकवायला, गृह-शिक्षक नेमला. आणि बघता-बघता… मुळातच प्रतिभावंत असलेली ही मृणालिनी… पाकळी-पाकळीने उमलंत… फुलू लागली… संपूर्ण उन्मिलित होण्यासाठी, सर्वांगाने उमलंत फुलवण्यासाठी, सुरू झालं तिचं उन्मिलन!! आणि बघता-बघता ही मृणालिनी इंग्रजी, संस्कृत, बंगाली या तिन्ही भाषांवर प्रभुत्व प्राप्त करत, पारंगत झाली. ही वेल त्या विराट वृक्षाच्या आधाराने, गगनावरी जाण्यास उत्सुक झाली.
आणि मग सुरू झाला एक अनोखा प्रवास… एका मुलीचा… अशिक्षित ते अनुवादक होण्याचा!
लग्नाच्या वेळी निरक्षर असलेल्या मृणालिनी देवी भाषांतरकार म्हणून नावारूपाला आल्या.
प्राचीन भारतीय ग्रंथांचा सखोल अभ्यास करताना, त्यांना वाटले की, हे ज्ञान बंगाली वाचकांना ही मिळावे. म्हणून मृणालिनी देवींनी…
महाभारतातील अत्यंत क्लिष्ट आणि तत्वज्ञानाने भरलेल्या शांती पर्वाचा बंगालीत अत्यंत सोपा अनुवाद केला. अगदी ज्ञानेश्वर माऊलींच्या… ऐसी अक्षरे रसिके मेळविन… ची च आठवण आली.
इतकंच नाही तर कठोपनिषद याचे केलेले भाषांतर त्यांच्या भाषिक आणि वैचारिक प्रगती चे उत्तम उदाहरण म्हणावे!! त्यांनी अनुवादकाच्या भूमिकेतून या ग्रंथांचे सांस्कृतिक, आणि दार्शनिक महत्त्व दाखवून दिले.
मृणालिनी देवींची आपल्या पतीची ख-या अर्थानं सहचरी होण्याची ही तळमळ थेट पोहोचते आपल्या अंतरंगात!! टागोर घराण्याचा वारसा असलेल्या साहित्य, नाट्य या दोन कलांवर मृणालिनी देवींनी ही आपला स्वतः चा असा एक वेगळा ठसा उमटवला. नाटकांतून ही प्रमुख नायिकेची भूमिका केली. याशिवाय बालसाहित्य, कथा लेखन, बोधकथा लेखन ही केले.
टागोरांच्या वाड्याचा उंबरठा ओलांडून आल्यापासूनच… त्या घराण्याच्या साहित्यिक वारसा जपंत, पुढे पाऊल टाकत निघालेल्या मृणालिनी देवी जणू त्या वाटेवर मोठ्या आत्मविश्वासाने चालत राहिल्या याच विश्वासाने…
हाती अमृताचा वसा, साथ देई माझा सखा
त्याच्या कृतार्थ डोळ्यांत, झुले उंच माझा झोका…
आणि खरंच रवींद्रनाथांच्या खंबीर साथीने… आधी वयातील अंतरामुळे औपचारिक असलेलं नातं, हळूहळू एक नितांत सुंदर असं बौद्धिक, भावनिक साहचर्याचं नातं झालं! टागोरांच्या परिवरातही त्या समरस झाल्या होत्या. आपल्या अनुवादाच्या आनंदात त्या आपल्या सासुबाईंनाही सामावून घेत. म्हणुनच की काय त्याची छोटी मुलगी मीरा आपल्या डायरीत लिहिती झाली…
” शांतिनिकेतन च्या दुस-या मजल्यावरील व्हरांड्यात एक टेबललॅंम्प जळतोयं. माझ्या आईच्या हातात एक इंग्रजी कादंबरी आहे. ती वाचतीये आणि माझ्या आजी साठी अनुवाद करतीये. “
फक्त मृणालिनी देवींच्या या बौद्धिक पैलूंची इतिहासात म्हणावी तशी नोंद नाही घेतली गेली… हे जाणवतं!
वयात खूप अंतर असुनही टागोरांच्या जीवनावर आणि कलेवर मृणालिनी देवींचा खूप प्रभाव दिसून येतो.
रविंद्रनाथ जेव्हा कामानिमित्त, प्रवासासाठी घराबाहेर असायचे तेव्हा ते मृणालिनी देवींना आवर्जून पत्रे पाठवीत. त्या दोघांतील सुसंवाद आणि प्रेमच तर दिसून येतयं ना यांतून! पत्नी कडून उत्तर यायला उशीर झाला तर नाराजी ही व्यक्त करत. ही पत्रे… हा प्रेमाचा ठेवा… विसा भारती द्वारे प्रकाशित Letters by टैगोर (Volume 1) मध्ये संग्रहित करण्यात आली आहेत.
मृणालिनी देवींचं आणखी एक परिपक्व, प्रगल्भ असं रूप बघायला मिळालं ते रवींद्रनाथांनी शांतिनिकेतन मध्ये सुरू केलेल्या ब्रह्मचर्य आश्रम या शाळेच्या प्रारंभिक अवस्थेत! त्यावेळी पैशाच्या अडचणीमुळे रविंद्रनाथ खूप चिंतेत होते. त्यावेळी त्यांची ही सहधर्मचारिणी ख-या अर्थाने त्यांच्या पाठीशी उभी राहिली आणि तिने आपले लग्नातील सगळे दागिने विकून पैसा उभा केला. आणि, साकार झाली रवींद्रनाथांच्या कल्पनेतील ती शाळा!
स्वतः मृणालिनी देवी कलकत्त्यातलं ऐश्वर्य सोडून आश्रमात रहायला आल्या. आणि विद्यार्थ्यांच्या रहाण्याची, जेवणाची, आरोग्याची काळजी घेऊ लागल्या. मुळातच सुगरण असलेल्या मृणालिनी देवी, स्वतः च्या हाताने सात्त्विक, पौष्टिक आणि चवदार स्वयंपाक बनवत आणि मायेनं जेवू घालंत. शाळेला कुटुंब रूप देऊन, त्या स्वतः आई झाल्या त्या सगळ्या मुलांची! टागोर घराण्याची स्वयंपाकाचे नवनवे प्रयोग करण्याची परंपरा येथे ही सांभाळली आणि आश्रमातील जेवणाची चव समृद्ध केली या अन्नपूर्णेनं!!
आणि आपल्या पूर्वाश्रमीचं नाव भवतारिणी सार्थ करत… रविंद्रनाथांच्या शांतिनिकेतन चा भव… संसार तारिणी सिद्ध झाली.
मृणालिनी देवींचं मोठं दुर्दैव की त्या अल्पायुषी ठरल्या. फक्त २८ वर्षे आयुष्य लाभलं त्यांना. पण तरीही रविंद्रनाथांच्या शैक्षणिक आणि सांस्कृतिक स्वप्नांना प्रत्यक्षात आणण्यासाठी त्यांनी पडद्यामागून मोठीच भूमिका बजावली. इच्छा असूनही आपल्या पतीला खूप वर्षे साथ मात्र नाही देऊ शकल्या त्या.
अचानकच मृणालिनी देवींना एका अज्ञात आजाराने ग्रासलं. दिवसेंदिवस त्यांची प्रकृती खालवत गेली. रविंद्रनाथ त्यांना इलाजासाठी आपल्या जोरासांको ठाकुर बारी येथे घेऊन गेले. तेव्हा गाडी ६ तास लेट असल्याने त्यांना विलासपूर येथील स्टेशन च्या वेटिंग रूममध्ये थांबावे लागले. त्यावेळी त्या वेळेत ही त्यांनी फांकी नावाची एक कविता रचली. ती आजही बिलासपूर च्या प्लॅटफॉर्म वरील एका भिंतीवर शिलालेखाच्या रूपात आहे. रविंद्रनाथांनी शिलालेखात अक्षर रूपात… अ क्षर केले… आपल्या वेदनेला!
शांतिनिकेतनला युनेस्को जागतिक वारसा… स्थळाचा दर्जा मिळवून देणा-या वटवृक्षाचे पहिले बीज ठरला… मृणालिनी देवींचा… आर्थिक आणि नैतिक पाठिंबा! तिथे त्यांच्यातील समिधा समर्पणात कुठेही कमी पडली नाही.
मृणालिनी देवींच्या निधनानंतर रविंद्रनाथांनी मृणालिनी आनंद नावाचा बगिचा तयार केला. तिथं अनेक प्रकारची फुलझाडे लावली. आपल्या ख-या अर्थाने सहचरी ठरलेल्या, प्रेरणा आणि समर्थनाचा अखंड स्त्रोत बनून राहिलेल्या पत्नीच्या निधनानंतर ही… तिची उपस्थिती… तिचं नाव टागोरांच्या कवितेत आणि संगीतात निरंतर गुंजत राहिलं. त्यांच्यातील नातं एक वारसा म्हणून टागोरांच्या काव्यरचनांमधील प्रेम, विरह, औदासीन्य यांत बघायला मिळतं…
तू जिथे गेली आहेस, तिथे माझे डोळे पोहोचू शकत नाहीत
पण तरीही, तू माझ्या मनात एक शांत प्रकाशासारखी जिवंत आहेस…
☆ एक मराठी विक्रमी व्यक्ती.. – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे☆
जपान मधील टोकियो मध्ये कसाई भागात एक मराठी विक्रमी व्यक्ती रहाते.. पुण्यात शनिवार पेठेतील शनिवार पोलीस चौकी जवळ त्यांचा वाडा होता. तो माणूस आता १९९५ ला जपान ची स्कॉलरशिप घेऊन जपान मधे जातो आणि तिथे एका प्रायव्हेट शाळेचा प्रिन्सिपल होतो.
त्यांची आई तिथे पुरण पोळी ते साबुदाणा खिचडी पर्यंत सर्व भारतीय चटण्या तसेच भारतीय पोशाख शिवते व भारतीय रेस्टोरंटही चालवते.
हा माणूस टोकियो मधे स्वतः तीन मजली प्रचंड मोठ घर बांधतो. घरात मराठी पुस्तकांची लायब्ररी करतो, तसेच मराठी भाषा शिकवण्याचे क्लासेसही घेतो. सर्व जपानी शाळांना आग्रह धरतो. हाच भारतीय मराठी माणूस जपान मध्ये नंतर तिथं आमदार होतो.
अजून बरंच काही आहे. पण सगळ्यावर कळस म्हणजे आता त्यांनी शिवाजी महाराजांचा पुतळा आपल्या घराशेजारी उभारला आहे. पुण्यातील खटावकर यांनी तो तयार केला. तो जपानला विमानाने १० लाख रुपये फक्त वाहतूक खर्च करुन नेला व ८ मार्च २०२५ ला तेथे उभारला. सुमारे ९०० भारतीय लोक उपस्थित होते. यांच्याकडे महाराजांनी लिहिलेल्या सुमारे ३०० हस्तलिखित पत्रांचा खजिना आहे.
… ह्या माणसाचं नाव आहे योगेंद्र पुराणिक.
☆
माहिती संग्राहक : अज्ञात
प्रस्तुती – श्री सुनीत मुळे
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ “आईने दिलेलं सुंदर उत्तर…” – लेखक : अज्ञात ☆ शोभा जोशी ☆
“मम्मी, तू आणि बाबांनी अनंत अडचणी असताना त्या काळात लग्न केलंत आणि एकमेकांना खूप समजून घेतलं.
गेली छत्तीस वर्षं संसार केलात. !
आमच्या पिढीला का गं जमत नाही हे.. ?”
तिशीची लेक हातातला फोन टेबलवर आपटत म्हणाली.
चार वर्षं मज्जेत ‘बॉयफ्रेन्ड’ असलेल्याचा आठ महिन्यापुर्वी ‘हजबन्ड’ झाल्यानंतरचा हा राग होता.
“प्रश्न विचारलास का?” पंचावन्नची आई त्या फोनला पडलेल्या चऱ्यांकडे पाहत शांत आवाजात म्हणाली, “उत्तर हवंय का?”
“हो, उत्तर हवंय, ” लेक म्हणाली.
“असे आहे न बाळा, ” आई सहजच म्हणाली…
“आम्ही ‘कसं जमवता येईल’ ते शोधत होतो, तुम्ही ‘जमलं तर पाहू’ म्हणताय.
आमच्या वेळी प्रेम हे व्हायचं,
तुमच्या काळात ते केलं जातं.
आम्ही साथीदार व्हायचो,
तुम्ही भागीदार बनवता.
आमच्यात प्रेम ही सहजता होती,
तुमच्यात तो अट्टहास झालाय.
आमचं प्रेम लहानाचं मोठं व्हायचं,
तुमचं प्रेम लहानपणीच घाई करतं.
आमच्या वेळी मैत्री विश्वासात रूपांतरित व्हायची,
तुम्ही ‘जवळिकीला’ रिलेशनशिपचा बोर्ड लटकवण्याची घाई करताय.
आम्ही कविता लिहायचो, तुम्ही त्या फॉरवर्ड करताय.
आमचे ‘जीवनसाथी’ होते,
तुमचे ‘बॉयफ्रेन्ड’ नि ‘गर्लफ्रेन्ड’ आहेत.
आमचं प्रेम आमच्यासाठी होतं,
तुमचं प्रेम ‘सगळ्या फ्रेन्ड्सचा बॉयफ्रेन्ड आहे, मग माझाही असलाच पाहिजे’, म्हणून केलं जातंय.
आमचे बॉयफ्रेन्ड नव्हते; कारण जो आहे तो फ्रेन्ड असण्याच्या खूप पुढे गेलाय, हे आम्हाला स्पष्ट जाणवायचं. तुमच्यात इन्स्टाग्रामवर अकाउंट असलंच पाहिजे तसा बॉयफ्रेन्डही असलाच पाहिजे.
आम्ही गिफ्ट नव्हे तर स्वत:लाच समर्पित करायचो; तुमच्या गळाभेटीतही भेट कितीची आणली असेल, याची कॅलक्युलेशन्स असतात.
आम्ही धुंद होतो;तुम्ही उधळलेले आहात.
आम्ही चेहऱ्यावरचं तेज शोधायचो;
तुम्ही शर्टचा ब्रान्ड पाहताय.
आम्हाला नजरेतली समजदार चमक भाळायची,
तुम्हाला गॉगलच्या किमती भुरळ घालतायत.
आमच्या शरीरांना पेशन्स मंजूर होता;
तुमच्या मनालाच तो नकोय.
बाळा… जमणं, न जमणं हे क्षमतेवर अवलंबून असतं.
क्षमता डेव्हलप करायची असते.. !
जगता आलं पाहिजे,
मरता केव्हाही येतं,
पण जगता आलं पाहिजे. !
सुख भोगता केव्हाही येतं,
पण दुःख पचवता आलं पाहिजे.
रंग सावळा म्हणून काय झालं,
कर्तृत्व उजळता आलं पाहिजे.
रंग गोरा असला म्हणून काय झालं,
मनावरील काजळी काढता आली पाहिजे.
यशानं माणूस उंच जातो,
पाय जमिनीवर ठेवता आले पाहिजेत.
मिळालेल्या यशात समाधान मानून आनंदी जीवन जगता आलं पाहिजे.
पाप काय?
कसंही करता येतं,
पण पुण्य करता आलं पाहिजे.
ताठ काय कोणीही राहतं, पण जरा झुकून वागता आलं पाहिजे.
ठेच जीवनात लागतेच,
सहन करता आली पाहिजे.
मलमपट्टी करून तिला, पुन्हा चालता आलं पाहिजे.
शहाण्याचं सोंग घेऊन,
वेडं होता आलं पाहिजे.
कशाला बळी न पडता, आनंदी जगता आलं पाहिजे.
जगण्याच्या लढाईत उणीव कायम भासेल,
ती उणीव भरता आली पाहिजे.
हास्य आणि अश्रूचा मिलाप करून,
फक्त समाधानी राहता आलं पाहिजे…
आयुष्य खूप सुंदर आहे
भरभरून जगता आले पाहिजे. “
जे काही लिहिले आहे ते आजच्या पिढीला डोळ्यात अंजन घालणारे आहे.
लेखक : अज्ञात
प्रस्तुती : शोभा जोशी
कार्यकर्ती, जनजाती कल्याण आश्रम, पुणे महानगर.
मो ९४२२३१९९६२
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ “सत्य असत्याशी मन केले ग्वाही” – लेखक : श्री जी. डी. पारेख☆ परिचय – श्री जगदीश काबरे ☆
पुस्तक : सत्य असत्याशी मन केले ग्वाही
लेखक : जी डी पारेख
प्रकाशक : गोल्डनपेज पब्लिकेशन, पुणे (पुस्तकासाठी संपर्क : ७७२२००५०८१)
एकूण पृष्ठे : १९६
किंमत : ₹ ३५०
संत तुकाराम महाराजांचे नाव महाराष्ट्रात सर्वांच्या ओठांवर आहे; परंतु त्यांच्या विचारांचे खरे आकलन मात्र दिवसेंदिवस दुर्मिळ होत चालले आहे. अभंगांचे पठण, वारीची परंपरा आणि ‘ग्यानबा-तुकाराम’चा जयघोष मोठ्या श्रद्धेने केला जात असला, तरी तुकोबांनी मांडलेली समता, बंधुता, मानवता, विवेक, नीतिमत्ता आणि अन्यायाविरुद्धचा संघर्ष यांचा मूळ आशय अनेकदा झाकोळला जातो. अशा वेळी जी. डी. पारेख लिखित ‘सत्य असत्याशी मन केले ग्वाही’ हा ग्रंथ संत तुकारामांचे केवळ भक्तिपर दर्शन घडवत नाही, तर त्यांच्यातील मानवतावादी तत्त्वज्ञ, समाजप्रबोधक आणि नैतिक क्रांतिकारक यांचे प्रभावी दर्शन घडवतो. संत तुकाराम महाराजांना महाराष्ट्राने डोक्यावर घेतले, त्यांच्या अभंगांना कंठस्थ केले, त्यांच्या नावाने लाखोंच्या संख्येने वाऱ्या केल्या; परंतु तुकोबांच्या विचारांचा आत्मा किती जणांनी स्वीकारला? हा प्रश्न आज पूर्वीपेक्षा अधिक तीव्रपणे उभा राहतो. कारण एका बाजूला तुकारामांच्या ‘भेदाभेद अमंगळ’चा जयघोष सुरू आहे, तर दुसऱ्या बाजूला समाजात द्वेष, जातीय विद्वेष, धार्मिक ध्रुवीकरण, असहिष्णुता आणि अंधश्रद्धांचे पुनरुज्जीवन होताना दिसते. अशा काळात जी. डी. पारेख यांचा ‘सत्य असत्याशी मन केले ग्वाही’ हा ग्रंथ केवळ तुकाराम महाराजांवरील आणखी एक पुस्तक म्हणून समोर येत नाही; तो तुकोबांच्या मूळ विचारांचे पुनराविष्कार घडवणारा आणि आपल्या सामाजिक विवेकाला जागवणारा वैचारिक दस्तऐवज म्हणून उभा राहतो.
‘भक्तीला नीतीचे वाहक बनवून मानवतेचा सोपान गाठू पाहणारा वारकरी रूपातील दार्शनिक’ हे या ग्रंथाचे उपशीर्षकच त्याच्या आशयाचे सार सांगून जाते. तुकोबांची भक्ती ही कर्मकांडी नव्हती, ती माणसाला माणसाशी जोडणारी होती. त्यांचा धर्म हा कोणत्याही जातीचा, पंथाचा किंवा सत्तेचा धर्म नव्हता; तो मानवतेचा धर्म होता. त्यांच्या अभंगांतून व्यक्त होणारा ईश्वर हा अन्याय, विषमता आणि दांभिकतेला मान्यता देणारा नसून सत्य, करुणा, समता आणि नीतिमूल्यांचा पुरस्कार करणारा आहे. लेखकाने या सर्व पैलूंचा अत्यंत अभ्यासपूर्ण आणि समकालीन संदर्भात पुनर्विचार केला आहे.
या ग्रंथाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे तो तुकोबांना वर्तमानाशी जोडतो. आज समाजात संविधानिक मूल्यांबद्दल वाढती उदासीनता वाढत असताना, ‘भेदभेद अमंगळ’ म्हणणाऱ्या तुकोबांच्या विचारांची नव्याने आठवण करून देण्याची गरज लेखक प्रकर्षाने मांडतो. समता, सामाजिक न्याय, बंधुभाव, करुणा आणि मानवतेची ही मूल्ये भारतीय संविधानाचा आत्मा आहेत, तीच मूल्ये संतांनी शतकांपूर्वी आपल्या अभंगांतून लोकांच्या मनात रुजविण्याचा प्रयत्न केला होता, हे या ग्रंथातून प्रभावीपणे अधोरेखित होते. या ग्रंथाची खरी ताकद त्याच्या वर्तमानाशी असलेल्या संवादात आहे. आज वारीत संविधान, पर्यावरण, समता आणि सामाजिक न्याय यांचे प्रबोधन करणाऱ्यांवर संशय घेतला जातो; काही वेळा त्यांना ‘अर्बन नक्षल’ या अपमानास्पद विशेषणांनीही हिणवले जाते. अशा वातावरणात लेखक अत्यंत नेमकेपणाने दाखवून देतात की, भारतीय संविधानाचा आत्मा आणि संत तुकारामांचा विचार यांच्यात मूलभूत विरोध नाही, तर विलक्षण साम्य आहे. समता, बंधुता, सामाजिक न्याय, मानवी प्रतिष्ठा आणि सर्वसमावेशकता ही मूल्ये संविधानाने स्वीकारण्याच्या कित्येक शतके आधी तुकोबांनी आपल्या अभंगांतून लोकांच्या मनात रुजविण्याचा प्रयत्न केला होता. म्हणूनच संविधानाची बाजू घेणे म्हणजे संतपरंपरेपासून दूर जाणे नव्हे; उलट तिच्या मूळ आत्म्याशी प्रामाणिक राहणे होय, हा महत्त्वपूर्ण संदेश हा ग्रंथ देतो. अशा पार्श्वभूमीवर ‘वृक्ष वल्ली आम्हा सोयरे वनचरे’ म्हणणाऱ्या तुकोबांच्या वारीत पर्यावरणसंवर्धनाचा संदेश देणे किंवा समता व संविधानाची आठवण करून देणे हे वारकरी परंपरेशी विसंगत नसून तिच्या मूळ आत्म्याशी सुसंगतच आहे, असा ठाम विचार हा ग्रंथ मांडतो. त्यामुळे वारीचा अर्थ केवळ धार्मिक सोहळा न राहता सामाजिक प्रबोधनाची लोकचळवळ म्हणून पुन्हा समजून घेण्याची प्रेरणा तो देतो. तुकोबांच्या वारीत पर्यावरणाचा संदेश नसेल तर तो कुठे असणार? समाजात समतेचा संदेश नसेल तर भक्तीचा अर्थ तरी काय उरतो? लेखक असे अनेक अस्वस्थ करणारे प्रश्न उपस्थित करतो. त्यामुळे वाचक केवळ पुस्तक वाचत नाही, तर स्वतःच्या श्रद्धा, मूल्ये आणि सामाजिक जबाबदारी यांचाही पुनर्विचार करू लागतो.
तुकारामांचे धर्मयुद्ध हे कोणत्याही व्यक्तीविरुद्ध नव्हते; ते अज्ञान, दांभिकपणा, बुवाबाजी, अन्याय, जातिभेद आणि धर्माच्या नावाखाली चालणाऱ्या शोषणाविरुद्ध होते. भक्तीला विवेकाची आणि नीतिमूल्यांची जोड नसल्यास ती समाजाला मुक्त करण्याऐवजी गुलाम बनवू शकते, हा अत्यंत महत्त्वाचा संदेश लेखक तुकोबांच्या अभंगांच्या आधारे स्पष्ट करतो. त्यामुळे हा ग्रंथ संतसाहित्याचा तसेच आजच्या सामाजिक आणि राजकीय वास्तवाला भिडणारा वैचारिक हस्तक्षेप ठरतो. तुकारामांनी ज्यांच्याविरुद्ध संघर्ष केला, तो ब्राह्मणांच्या विरोधात नव्हता तर त्यांच्या वर्णवर्चस्ववादी प्रवृत्तीच्या विरोधात होता. धर्माच्या नावाखाली चालणारा व्यापार, अंधश्रद्धा, बुवाबाजी, जातिभेद, नैतिक अधःपतन आणि विवेकशून्यता यांच्या विरोधात त्यांनी उभे केलेले धर्मयुद्ध आजही तितकेच सुसंगत आहे. त्यामुळे तुकोबांना केवळ टाळ-मृदंगात किंवा दिंडीत शोधून चालणार नाही; त्यांना समाजाच्या विचारविश्वात पुन्हा प्रतिष्ठित करावे लागेल. जी. डी. पारेख यांचा हा ग्रंथ नेमके तेच कार्य करतो.
आज संतपरंपरेचे नाव घेऊन तिच्यात पुन्हा एकदा ब्राह्मणी विचार मिसळण्याचे प्रयत्न सुरू आहेत. भक्तीला विवेकापासून, धर्माला नीतिमत्तेपासून आणि वारीला सामाजिक प्रबोधनापासून वेगळे करण्याची धडपड होत आहे. अशा वेळी ‘सत्य असत्याशी मन केले ग्वाही’ हा ग्रंथ तुकोबांच्या मूळ मानवतावादी परंपरेची आठवण करून देतो. संतांचा वारसा जपायचा असेल, तर त्यांच्या नावाचा जयघोष करण्यापेक्षा त्यांच्या विचारांचा स्वीकार अधिक महत्त्वाचा आहे, हे तो ठामपणे सांगतो. संतपरंपरेवर जमा झालेली संकुचित विचारसरणीची धूळ झटकून तिच्यातील सार्वकालिक मानवतावादी तेज पुन्हा अनुभवायचे असेल, तर हा ग्रंथ नक्कीच वाचला पाहिजे. आजच्या महाराष्ट्रात संत तुकारामांचे नाव मोठ्या श्रद्धेने घेतले जाते; आता धार्मिक पुनरुज्जीवनवादाच्या काळात त्यांच्या विचारांनाही तितक्याच प्रामाणिकपणे समजून घेण्याची वेळ आली आहे. त्या दिशेने वाट दाखवणारा हा एक महत्त्वपूर्ण, चिंतनगर्भ आणि काळाची गरज ठरलेला हा ग्रंथ आहे.
हा ग्रंथ वाचून तुकोबांची प्रतिमा अधिक स्पष्ट होते. भक्तीतून नीती, नीतितून समता आणि समतेतून मानवतेचा मार्ग दाखवणारे तुकाराम आजच्या महाराष्ट्राला पुन्हा या ग्रंथातून भेटतात. म्हणूनच हा ग्रंथ केवळ संतसाहित्याचा अभ्यास नसून, वर्तमानाला प्रश्न विचारणारा, समाजाला आत्मपरीक्षण करायला भाग पाडणारा आणि मानवतावादी महाराष्ट्राची दिशा दाखवणारा एक महत्त्वपूर्ण वैचारिक ग्रंथ आहे. हा ग्रंथ लिहून जी डी पारेख यांनी प्रबोधनाला आणखी सशक्त केले आहे. जी डी पारेख यांच्या कार्यकर्तृत्वाला सलाम……
☆
परिचय : श्री जगदीश काबरे
मो ९९२०१९७६८०
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
(वरिष्ठतम साहित्यकार आदरणीय डॉ कुन्दन सिंह परिहार जी का साहित्य विशेषकर व्यंग्य एवं लघुकथाएं ई-अभिव्यक्ति के माध्यम से काफी पढ़ी एवं सराही जाती रही हैं। हम प्रति रविवार उनके साप्ताहिक स्तम्भ – “परिहार जी का साहित्यिक संसार” शीर्षक के अंतर्गत उनकी चुनिन्दा रचनाएँ आप तक पहुंचाते रहते हैं। डॉ कुंदन सिंह परिहार जी की रचनाओं के पात्र हमें हमारे आसपास ही दिख जाते हैं। कुछ पात्र तो अक्सर हमारे आसपास या गली मोहल्ले में ही नज़र आ जाते हैं। उन पात्रों की वाक्पटुता और उनके हावभाव को डॉ परिहार जी उन्हीं की बोलचाल की भाषा का प्रयोग करते हुए अपना साहित्यिक संसार रच डालते हैं।आज प्रस्तुत है आपकी एक अप्रतिम एवं विचारणीय कथा – ‘माया-मोह की फांस‘। इस अतिसुन्दर रचना के लिए डॉ परिहार जी की लेखनी को सादर नमन।)
☆ साप्ताहिक स्तम्भ – परिहार जी का साहित्यिक संसार # ३४० ☆
☆ लघुकथा ☆ माया-मोह की फांस ☆ डॉ कुंदन सिंह परिहार ☆
नायक जी के दुआरे पर बड़ा समूह इकट्ठा है। पुरुष और स्त्रियां दोनों हैं। दरअसल नायक जी नर्मदा यात्रा पर निकल रहे हैं। करीब पंद्रह दिन नर्मदा के किनारे किनारे चलेंगे। फिर अगली बार यात्रा वहीं से उठाएंगे जहां से उसे छोड़ा था। ऐसे ही किश्तों में यात्रा होती है।
नायक जी के साथ आठ दस लोग जा रहे हैं। उनकी पत्नियां उन्हें विदा करने आयी हैं। समूह में दो बोझा ढोने वाले हैं जो बहंगी में सामान लेकर चलेंगे। बोझा मतलब राशन-पानी, खाना खाने और बनाने के बर्तन। कुछ तैयार नाश्ते का सामान भी।
भीड़ में गोपाल भी है। सामान की उठा-धराई में मदद कर रहा है।
दल का एक सदस्य गोपाल से पूछता है, ‘तुम भी चल रहे हो?’
जवाब मिलता है, ‘नहीं, अभी नहीं। अभी नर्मदा मैया की कृपा नहीं है।’
सदस्य कहता है, ‘क्यों! चलो। ऐसा मौका फिर कहां मिलेगा? पुन्य कमाने का मौका बार-बार नहीं मिलता।’
गोपाल जवाब देता है, ‘क्या करें! बड़ी मजबूरी है। पिताजी की तबियत ठीक नहीं है। डेढ़ साल से उठने बैठने से लाचार हैं। हमीं को पूरी देखभाल करनी पड़ती है। चौबीस घंटे की ड्यूटी है। कहीं जाने की कहूं तो हाथ पकड़ कर रोने लगते हैं।
सदस्य कहता है, ‘घर में और लोग भी तो होंगे। लड़के बच्चे तो होंगे।’
गोपाल बोला, ‘सब हैं, लेकिन पिताजी हमें ही ढूंढ़ते हैं। और किसी को अपने को छूने नहीं देते।’
सदस्य बोला, ‘फालतू माया-मोह में फंसे हो। एक बार निकल पड़ो। लौट कर पाओगे कि तुम्हारे बिना भी सब ठीक-ठाक चलता है। हम तो अपना झोला उठाकर निकल पड़ते हैं। लौट कर आते हैं तो सब ठीक मिलता है। लेकिन हम सोचते हैं कि दुनिया हमारे बिना नहीं चल सकती।’
गोपाल हाथ जोड़कर बोला, ‘आप ठीक कहते हो, लेकिन हमारा मन नहीं मानता। उन्हें छोड़कर कैसे चले जाएं?’
जत्था ‘नर्मदे हर’ का घोष करके रवाना हो गया और गोपाल अपने घर की तरफ चल पड़ा जहां उसके पिता नींद से जाग कर उसके लिए गुहार लगा रहे थे।