मराठी साहित्य – काव्यानंद ☆ कळी फूल होताच… – राधा गर्दे ☆ रसग्रहण… सुश्री अरुणा मुल्हेरकर ☆

अरुणा मुल्हेरकर

? काव्यानंद ?

☆ कळी फूल होताच… – राधा गर्दे ☆ रसग्रहण… अरुणा मुल्हेरकर ☆

☆ कळी फूल होताच… – राधा गर्दे ☆

(भावगीत)

कळी फूल होताच धुंदावली

वसंतासवे गर्विता जाहली॥ध्रु॥

*

सुगंधात न्हाऊन सुस्नात ही

दवाची गळा माळ घालोन ही

कशी ऐट दावीत गंधाळली

वसंतासवे, गर्विता जाहली ॥१॥

*

अली चुंबिता रोखुनी पाहते

तरी मुग्ध होऊनिया लाजते

मनाने अलिशी असे बांधली

वसंतासवे गर्विता जाहली ॥२॥

*

मिटे पाकळ्यांना हळू रुपसी

खुले रूप लावण्य हे राजसी

जणू मेनकारूप ही ल्यायली

वसंतासवे गर्विता जाहली॥३॥

*

पहाटेस निहार सुस्तावता

चकाकून देहावरी थांबता

शहारुन ती बावरू लागली

वसंतासवे, गर्विता जाहली ॥४॥

कवयित्री सौ. राधा गर्दे यांचे हे भावगीत वाचले आणि ताबडतोब त्यांच्या परवानगीने मी रसग्रहण लिहायला बसले.

सौ. राधा गर्दे या संस्कृत पंडिता आहेत. त्यांच्या काव्यातून अनेकदा संस्कृत शब्दांचा मुक्त संचार आढळतो. खरं सांगायचं तर संस्कृत ही मराठी भाषेची जननी आहे, आणि जेव्हा आपण भारदस्त भाषा वापरतो तेव्हा या संस्कृत शब्दांच्या पखरणीमुळे भाषेचे सौंदर्य वाढते. राधाताईंच्या या कवितेतून नेमके हेच चित्र दृश्यरूप झाल्याचे आढळते.

 कळी फुल होताच धुंदावली

 वसंतासवे गर्विता जाहली॥ध्रु॥

ध्रुवपदाच्या या दोन ओळी वाचता क्षणीच आपल्या नजरेसमोर चित्र येते ते वसंत ऋतुतल्या बहराचे. जिकडे तिकडे जाई, जुई, मोगरा, चमेली, सोनचाफा ही सुगंधित फुले फुललेली असतात आणि वातावरणात एक प्रकारची प्रसन्नता दिसून येते. या फुलातील एका कळीला तिच्या सौंदर्याचा गर्व होतो अशी कवयित्रीची कल्पना आहे.

 सुगंधात न्हाऊन सुस्नात ही

 दवाची गळा माळ घालोन ही

कशी ऐट दावीत गंधाळली

वसंतासवे…

हे कळीचे नुकतेच उमलून आलेले फुल त्याच्यावरील दवबिंदूंच्या वर्षावाने जणू काही न्हाऊन निघाले आहे आणि मोठ्या रुबाबात ते त्याचा परिमळ सर्वत्र पसरवत आहे.

 अली चुंबिता रोखुनी पाहते

 तरी मुग्ध होऊनिया लाजते

 मनाने अलीशी असे बांधली

 वसंतासवे…

या दुसऱ्या अंतर्‍यात त्या फुलावर लुब्ध होऊन

अली म्हणजे भ्रमर त्याचे चुंबन घेत आहे आणि ते फुल अतिशय मुग्ध व लज्जीत झाले आहे. त्या फुलाच्या मनात या मधुपा विषयी गोड प्रेम भाव निर्माण झाला आहे.

 मिटे पाकळ्यांना हळू रुपसी

 खुले रूप लावण्य हे राजसी

 जणू मेनका रूप ही ल्यायली

 वसंतासवे…

राधाताई या तिसऱ्या कडव्यात काय सांगत आहेत? तर लाजेने ते फुल आपल्या पाकळ्या अलगदपणे मिटून घेत आहे आणि त्यामुळे त्याचे राजस रूप अधिकच खुलले आहे.

 पहाटेस निहार सुस्तावता

 चकाकून देहावरी थांबता

 शहारुन ती बावरू लागली

 वसंतासवे, गर्विता जाहली.

या शेवटच्या अंतऱ्यात त्या फुलाची अवस्था राधाताईंनी फार सुंदर शब्दात वर्णन केली आहे. पहाटेच्या वेळी जशी काही दाट धु क्याची शाल फुलाच्या सर्वांगावर घातली आहे, पहाटेच्या गारव्यामुळे ते फुल जसे काही शहारून गेले आहे.

हा झाला या कवितेचा शब्दशः अर्थ. पण जसजशी ही कविता वाचत जावी तसतसे लक्षात येते की हे एका कळीचे फुलात झालेल्या रूपांतराचे नुसते प्रासादिक वर्णन नसून ही संपूर्ण कविता म्हणजे एक रूपक आहे.

एका मुग्ध बालिकेने नुकतेच तारुण्यात पदार्पण केले आहे. वसंत ऋतु म्हणजे त्या वयात आलेल्या मुलीच्या मनातील मधुर सुगंधित असे भाव आहेत. तिच्या सौंदर्याचा तिला थोडा गर्व झाला आहे, त्याची ऐट दाखवत ती रुबाबात वावरते आहे. तिचे चुंबन घेणारा भ्रमर हा दुसरा तिसरा कोणी नसून तिचा सखा आहे. त्याच्यासोबत ती मनाने जोडली गेली आहे. त्याच्या स्पर्शाने तिचे रोमरोम शहाले आहे आणि स्त्री सुलभलज्जेने तिचे सौंदर्य इतके खुलले आहे की जणू काही स्वर्गातली अप्सरा मेनकाच पृथ्वीतलावर अवतरली आहे. पहाटेचे धुके म्हणजे प्रियकराच्या सहवासातील प्रेम आहे. त्या प्रेमाच्या धुंदीत तिचे मन बावरून गेले आहे.

चेतनगुणोक्ती अलंकाराने सजलेली राधाताईंची ही कविता प्रत्येक वाचकाच्या मनाचा ठाव घेणारे एक सुंदर भावगीत आहे.

भुजंगीवृत्तात ही कविता राधाताईंनी अगदी सहज लिहिल्यासारखी वाटते. अली, निहार, राजसी इत्यादी शब्द कवितेत कसे अगदी चपखल बसले आहेत. रूपसी राजसी, सुस्तावता थांबता वगैरे स्वरयमकेही सहज वाटतात. कुठेही कसलीही ओढाताण नाही. वृत्तबद्ध कविता लिहिणे ही गोष्ट तशी सहज करता येण्यासारखी नाही, कारण कवीला सुचलेला शब्द वृत्ताच्या लगावलीत किंवा मात्रेत बसतोच असे नाही. अशावेळी कवीच्या प्रतिभेचा कस लागतो. राधाताई शब्दांच्या या झटापटीतून अगदी अलगद बाहेर पडल्याचे दिसून येते.

अशाच लिहित्या रहा. पुढील वाटचालीसाठी आपल्याला खूप खूप शुभेच्छा!

© अरुणा मुल्हेरकर 

डेट्राॅईट (मिशिगन) यू.एस्.ए.

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ उगवतीचे रंग – माझं जीवन हाच माझा संदेश… ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्री विश्वास देशपांडे

? विविधा ?

☆ उगवतीचे रंग – माझं जीवन हाच माझा संदेश… ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

नाशिक आजचं आणि पूर्वीचं…! जमीन-अस्मानाचा बदल झाला आहे यात. काळानुसार शहराचे चेहरेमोहरे बदलले, पण एक गोष्ट मात्र शतकानुशतके तीच राहिली आहे—ती म्हणजे ही संथ वाहणारी गोदामाई! पण तिचं पाणी तेव्हा मुक्तपणे, अवखळपणे वाहत होतं. आज ते ठिकठिकाणी सिमेंटच्या भिंतींनी अडवलंय. ते पाणी तेव्हा ओंजळीने सहज पिता यायचं; आजची परिस्थिती तर तुम्ही जाणताच. इथे बारा वर्षांतून एकदा कुंभमेळा भरतो, त्यानिमित्ताने शहरात नव्या तयारीची लगबग सुरू असते. मी काठावर उभा राहून ती सगळी गर्दी, तो कोलाहल पाहत असतो… आणि मग माझ्या मनात चक्रं फिरतात, मला आठवतात ते पूर्वीचे दिवस!

साधारण ७,००० वर्षांपूर्वीची ही गोष्ट. ज्या काळात आजच्यासारखी वाहने नव्हती, रस्ते नव्हते, चहूकडे फक्त अथांग आणि घनदाट जंगले होती. अशा अरण्यांमध्ये हिंस्ट्र श्वापदे आणि क्रूर प्रवृत्तीच्या राक्षसांची वस्ती होती. अशा एका भीषण कालखंडात या जीवनकथेची सुरुवात होते.

माझे नुकतेच लग्न झाले होते. डोळ्यांत भविष्याची सुंदर स्वप्ने रेंगाळत होती. सुखाचे दिवस आता मोरपिसारा फुलवून अंगणात आले असे वाटत असतानाच, अचानक परिस्थितीने एक क्रूर वळण घेतले. नियतीच्या एका फटकाऱ्यासरशी मला अचानक राजवैभव, राजमुकुट सोडून १४ वर्षांचा वनवास पत्करावा लागला. महालात सुखासीन आयुष्य जगलेली माझी सुशील, सुकुमार आणि सुंदर पत्नी मला संकटात साथ देण्यासाठी राजवैभवाचा त्याग करून स्वतःहून माझ्यासोबत वनवासात आली. मी कितीही नाही म्हणत असताना, माझ्यावर अपार प्रेम करणारा आणि जणू माझेच प्रतिबिंब असलेला माझा धाकटा भाऊदेखील आमची सावली बनून सोबत निघाला. उत्तरेकडून प्रवास करत करत आम्ही या दक्षिणायनात येऊन पोहोचलो. सोपा नव्हता हा प्रवास; या वाटेने आम्हाला जगण्याचं खूप मोठं तत्त्वज्ञान शिकवलं.

असे भटकत आम्ही आलो नाशिकच्या या रम्य परिसरात. घनदाट अरण्य, वटवृक्षांची केवढी ती गर्दी आणि त्यांची ती शीतल छाया! हे ठिकाण आमच्या मनाला खूप भावले. ठरवले, आता काही काळ तरी इथंच मुक्काम करायचा. खळाळत वाहणारी गोदामैयाही जणू आम्हाला साद घालत होती, “आता दुसरीकडे कुठे जाऊ नका, माझ्याच कुशीत विसावा घ्या. ” मग गोदेच्या त्या सुंदर, निर्मळ जलाच्या काठी, पंचवटीच्या निसर्गरम्य परिसरात आम्ही आमची छोटीशी पर्णकुटी बांधली. तिथल्या पावन वातावरणात आमचा संसार सुखाचा सुरू झाला. दिवस सुखाचे जात होते… पण एक दिवस अचानक घात झाला!

मी कुटीत नव्हतो आणि परतून पाहतो तर माझी लाडकी, प्राणप्रिय पत्नी तिथे नव्हती! कोणीतरी तिचे कपटाने हरण केले होते. माझ्या पायाखालची जमीनच सरकली, डोळ्यांसमोर गहिरा अंधार दाटून आला. कोण होता तो? कुठे घेऊन गेला असेल तिला? काहीच ठाऊक नव्हते. आयुष्यात असं काही वादळ येईल, याची मी स्वप्नातही कल्पना केली नव्हती.

सामान्यांसारखे डोळ्यात पाणी आणून खचून बसण्याचा तो क्षण होता. पण अंतरात्म्याने हार मानणे नाकारले. मी ठरवले, ‘ छे असं हताश होऊन नाही चालणार. परिस्थितीपुढे गुडघे टेकायचे नाहीत! मी आणि माझ्या धाकट्या भावाने पाठीवर धनुष्यबाण चढवले, विझलेला निखारा पुन्हा पेटवला आणि त्या अनोळखी, खडतर वाटेवर पाऊल ठेवले. वाट दिसेल तिकडे आम्ही मार्गक्रमण करू लागलो. पायात पादत्राणे नव्हती की पाठीशी राज्याचे लष्कर नव्हते की हाती कोणती सत्ता नव्हती. होते ते फक्त मनातले ध्येय आणि सत्यावरची अढळ निष्ठा!

आम्ही दक्षिण दिशेने पायी चालू लागलो. वाटेत संकटांचे महाकाय डोंगर उभे होते. पण या प्रवासात मला एक गोष्ट उमजली—आयुष्यात संकटं कितीही मोठी आली, तरी निराश होऊन थांबायचं नसतं. जो थांबला तो संपला, जो चालत राहिला तोच जिंकला! या प्रवासात आम्हाला जंगलात राहणारी, वंचितांचे आणि शोषितांचे आयुष्य जगणारी साधी-भोळी वनवासी माणसे भेटली. त्यांच्यावर एका बलाढ्य, उन्मत्त आणि अत्यंत शक्तिशाली सम्राटाचा भयंकर जुलूम सुरू होता. तो शत्रू इतका बलाढ्य होता की त्याच्याकडे सोन्याची नगरी होती, अथांग सैन्य होते आणि अफाट ताकद होती. ही साधीभोळी माणसे त्याच्या दहशतीच्या छायेत आपले रोजचे आयुष्य कंठत होती. या अशा भयाण जगण्याला काय जगणं म्हणायचं? हे सगळं माझ्या मनाला खटकत होतं. मी ठरवलं, स्वतःचं दुःख काही काळ बाजूला ठेवायचं आणि या भोळ्या-भाबड्या लोकांना एकत्र करून त्यांना अन्यायाचा प्रतिकार करायला शिकवायचं!

वेळ पडली तर मला देखील या अन्यायी महासत्तेशी लढावं लागणार होतं. मी विचार केला, मी एकटा या महासत्तेशी कसा लढणार? पण अंतर्मनाने सांगितले की खरी शक्ती ही केवळ शस्त्रात नसते, ती असते माणसांच्या एकजुटीत आणि आत्मबळात! मी त्या जंगलातील आदिवासींना, वानर समूहाला एकत्र केले. त्यांना हाक दिली, “मित्रहो, जुलूम सहन करणे हे मरणाहून वाईट आहे. घाबरू नका, मी तुम्हाला लढायला शिकवीन! ” त्यांचा माझ्या शब्दावर विश्वास बसला. आम्ही त्यांना एकत्र आणले, संघटित केले, युद्धकलेचे प्रशिक्षण दिले, त्यांना त्यांच्या आत्मसन्मानाची जाणीव करून दिली; आणि पाहता पाहता एका मातब्बर हुकूमशहाविरुद्ध एक अभेद्य ‘लोकचळवळ’ उभी राहिली. त्या वनवासी मंडळींनी मग माझ्या संकटात सावलीसारखे उभे राहण्याची तयारी दाखवली.

तिथून पुढे आम्ही भारताच्या दक्षिण टोकापर्यंत, म्हणजेच अथांग समुद्राच्या किनाऱ्यापर्यंत पोहोचलो. समोर पसरलेला महासागर गर्जत होता. आपल्याला ज्या शत्रूशी मुकाबला करायचा आहे, तो पार या समुद्रापलीकडे आहे हे समजले होते. पण आता वाट संपली होती. शत्रू समुद्रापलीकडे वैभव उपभोगत होता आणि आम्ही अलीकडे किनाऱ्यावर उभे होतो. पुन्हा तोच यक्षप्रश्न—हा अथांग समुद्र कसा ओलांडायचा? पण जेव्हा हेतू प्रामाणिक आणि पवित्र असतो, तेव्हा निसर्गही रस्ता देतो. आम्ही दगड-धोंडे गोळा केले, प्रत्येकाने आपापल्या ताकदीप्रमाणे खारीचा वाटा उचलला आणि विश्वासाच्या बळावर समुद्रावरही सेतू बांधून पूर्ण केला! आजपर्यंत समुद्रावर सेतू कोणी बांधला नव्हता. पण ते आश्चर्य घडले. सगळ्यांच्या साथीने आणि सहकार्याने ही अशक्य वाटणारी गोष्ट साध्य झाली.

त्यानंतर काय झाले, तो एक इतिहासच आहे. अटीतटीचे, घनघोर युद्ध झाले. आम्ही आमचे सर्वस्व पणाला लावले होते. अखेर तो बलाढ्य, उन्मत्त शत्रू पराभूत झाला; अधर्माचा नाश झाला आणि सत्याचा विजय झाला! पण हे सगळे यश केवळ माझे नव्हते. माझ्यासाठी प्राणाची आहुती द्यायला तयार असणाऱ्या माझ्या साऱ्या वनवासी, सहकारी बांधवांच्या एकजुटीचे हे यश होते. तिथेच माझी प्राणप्रिय पत्नी मला पुन्हा भेटली. विजय मिळवल्यानंतर माझ्या हातात त्या शत्रूचे अथांग, सोन्यासारखे लखलखणारे साम्राज्य चालून आले होते. कोणीही असते तर त्या वैभवाला भुलले असते. माझ्या भावानेही भावनावश होऊन मला विचारले, “दादा, आपण आपले राज्य तर सोडलेच आहे, तर या सुवर्ण भूमीतच राहायला काय हरकत आहे? “

पण मी मंद हसलो. मी त्या सुवर्णनगरीकडे पाहिले आणि म्हणालो, “नाही बंधो, हे वैभव कितीही अथांग असले, तरी माझ्या मातृभूमीची सर याला येऊ शकत नाही! “

अपि स्वर्णमयी लंका न मे लक्ष्मण रोचते।

जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी॥

(ही सोन्याची लंका मला भुरळ पाडू शकत नाही. जननी आणि जन्मभूमी हे स्वर्गापेक्षाही श्रेष्ठ आहेत.)

 मित्रांनो, हा माझा ७, ००० वर्षांपूर्वीचा प्रवास आज तुम्हाला का सांगतोय? कारण, तुम्हा प्रत्येकाचं जीवन ही देखील एक अविरत लढाई आहे, हे मी जाणतो. आज तुम्हीही अशाच अनंत संकटांशी, अपयशाशी लढत आहात. तुमच्या जगातील समस्या कदाचित वेगळ्या असतील, आधुनिक जीवनशैलीने त्या तुमच्यासमोर उभ्या केल्या असतील. पण परिस्थिती कशीही असू द्या, शाश्वत जीवनमूल्ये कधीही कालबाह्य होत नाहीत!

हिंमत हरू नका. अनंत संकटे वेगवेगळ्या रूपात तुमच्या समोर उभी राहतील. कधी पराभव स्वीकारावा लागेल, कधी अपमान होईल, तर कधी विपरीत परिस्थिती मानसिक खच्चीकरण करेल. कधी एखादा बलाढ्य वाटणारा आजार किंवा बिकट आर्थिक परिस्थिती तुमच्यासमोर रावणासारखी उभी ठाकेल. पण लक्षात ठेवा, परिस्थिती कितीही अंधःकारमय असली, तरी धीर सोडू नका. तुमच्यातल्या सुप्त आत्मबळाला जागवा, प्रामाणिक माणसांची साथ घ्या आणि लढत राहा. मात्र, कोणतीही किंमत मोजावी लागली तरी आपली जीवनमूल्ये आणि आदर्श कधीही सोडू नका.

कदाचित तुम्हाला वाटेल, या पडत्या काळात हा अनुभव सांगणारा मी कोण?

मी दुसरा कोणी नसून, ७, ००० वर्षांपूर्वी नाशिकच्या याच गोदावरीच्या काठावरून, पंचवटीतून पायी निघून, अथांग समुद्र ओलांडून लंकेवर विजय मिळवणारा, दशरथाचा पुत्र ‘राम’ आहे. आणि हा माझा, तुमचा, आपल्या सर्वांचा जीवनप्रवास आहे. लक्षात ठेवा, अंधार कितीही गडद असला, तरी शेवटी विजय ‘उगवत्या रंगांचाच’ म्हणजेच प्रकाशाचाच होतो!

© श्री विश्वास देशपांडे

चाळीसगाव

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ देणाऱ्याने देत जावे ! ☆ डॉ मकरंद पिंपुटकर ☆

डॉ मकरंद पिंपुटकर

? जीवनरंग ?

☆ देणाऱ्याने देत जावे ☆ डॉ मकरंद पिंपुटकर 

(विंदा)

गोष्ट १९६४-६५ सालातली. नागरजीभाई मेहता हे गोखले एज्युकेशन सोसायटीच्या (पूर्वीच्या ठाणे – आत्ताच्या पालघर जिल्ह्यातील) बोर्डी गावातल्या शाळेतले शिक्षक – आज जरा ते चिंतामग्न होते. निवृत्ती जवळ आलेली. पण घरची आर्थिक घडी म्हणावी तशी नीट बसलेली नव्हती. चारही अपत्यांची शिक्षणं अजून पूर्ण व्हायची होती – अजून ती मार्गी लागायची बाकी होती. निवृत्तीनंतर ही गणितं कशी जुळणार? गुरुजी तर अगदी हवालदिल होऊन गेले होते.

शेवटी मनाचा हिय्या करून त्यांनी सोसायटीचे सर्वेसर्वा – सेक्रेटरी साहेबांना एक विनंती अर्ज पाठवून दिला. वयानुसार निवृत्तीकाळ आला आहे पण आर्थिक अडचणी लक्षात घेता मेहेरबानी करून एक वर्ष मुदतवाढ मिळू शकेल का अशी विनंती त्या पत्रात केली होती.

अर्ज विचारात घेतला गेला, गुरुजींचा व्यासंग आणि अनुभव लक्षात घेता, विशेष प्रकरण / case म्हणून संस्थेद्वारा एक वर्षाची मुदतवाढ देण्याची मंजूरी आली. गुरुजींना हायसे वाटले.

इथे नियतीने एक वेगळीच कलाटणी घेतली. संस्थेच्या कारकुनाने गुरुजींच्या अर्जाची प्रत शिक्षण मंत्रालयाला पाठवून दिली व मुदतवाढीचा अर्ज केला. कागदी घोडे त्यांच्या गतीने चालले व सरकारकडूनही गुरुजींच्या मुदतवाढीस मंजुरी आली. कारकुनाने ही बाब सेक्रेटरी साहेबांच्या कानी घातली.

दिवसामागून दिवस भराभर चालले होते. गुरुजींचे अध्यापनाचे काम नेहमीप्रमाणेच जोमात चालू होते. आणि तेव्हाच सेक्रेटरी साहेबांचा निरोप आला.

“मी सोसायटीद्वारा तुम्हाला एक वर्षाची मुदतवाढ मंजूर केली होती. या वर्षी सरकारनेच तुम्हाला मुदतवाढ दिली आहे. तुमचा या वर्षीचा पगार सरकारकडूनच येणार आहे, त्यामुळे तुम्ही सोसायटीला पुढच्या वर्षीच्या मुदतवाढीसाठी पुन्हा अर्ज करा. तुम्हाला सोसायटीतर्फे अजून एक वर्ष मुदतवाढ मिळेल. “

गुरुजी आनंदले. त्यांनी परत अर्ज केला. तो मंजूर झालाच पण कारकूनानेही परत सरकारकडून आणखी एका वर्षाचे extension मिळवले.

पुढची ४-५ वर्षे हा सिलसिला चालूच राहिला. गुरुजींच्या मुलांची शिक्षणं पूर्ण झाली, मुलं हाताशी आली आणि शेवटी गुरुजींनी स्वत:हून सेक्रेटरी साहेबांना पत्र लिहीले व आता निवृत्त होण्यासाठी परवानगी मागितली.

— —

१९९३ –

१९१८ साली स्थापन झालेल्या गोखले एज्युकेशन सोसायटीचे ७५ वे वर्ष मोठ्या दिमाखात साजरे करायचे घाटत होते. त्यानिमित्ताने संस्थेच्या बोर्डी शाळेतील हयात असलेल्या निवृत्त कर्मचाऱ्यांना बोलावून त्यांचा सत्कार करण्याचा कार्यक्रम आयोजिलेला होता. मेहता गुरुजींनाही आमंत्रण गेले होते. मात्र गुरुजींचे ज्येष्ठ चिरंजीव झोनल सेक्रेटरींना प्रत्यक्ष येऊन भेटून गेले – आपण देऊ केलेल्या सन्मानाबद्दल आम्ही शतशः ऋणी आहोत, पण गुरुजी अंथरुणाला खिळून आहेत. ते इथे कार्यक्रमाला उपस्थित नाही राहू शकणार.

झोनल सेक्रेटरींनी हा निरोप सेक्रेटरी साहेबांना कळवला होता. सेक्रेटरी साहेबांनी त्यांची appointements diary पाहिली व बोर्डी झोनल सेक्रेटरींना एक निरोप पाठवला. ते स्वत: मेहता गुरुजींच्या घरी जाऊन त्यांचा सत्कार करणार होते.

मेहता गुरुजींच्या घरी निरोप पाठवण्यात आला. मुलाला आनंद झालाच पण गुरुजींना यातील काय कळणार असा प्रश्नही पडला. गुरुजींचे वय आता नव्वदीच्या पुढे गेले होते, गेले सहा महिने ते कोमा सदृश निपचित पडूनच होते. पण त्याने सेक्रेटरी साहेब येणार असा निरोप मात्र गुरुजींना सांगितला.

बोर्डीतील माजी शिक्षकांच्या सत्काराचा कार्यक्रम फारच हृदयस्पर्शी झाला. सेक्रेटरी व झोनल सेक्रेटरी आता गुरुजींच्या घरी – बोर्डीपासून ४०-५० किलोमीटर दूर – वलवाडा गावी निघाले होते.

गुरुजींच्या घरी ते पोचल्यावर मुलाने गुरुजींना सेक्रेटरी साहेब आले आहेत असं सांगितले मात्र, जणू जादूची कांडी फिरावी तसे गुरुजी उठून बसले. हात जोडून ते म्हणाले, “सोसायटीचे माझ्यावर अगणित उपकार आहेत, बोला मी आपली काय सेवा करू शकतो? “

ज्या सेक्रेटरी साहेबांनी आपल्याला नोकरीत मुदतवाढ दिली ते साहेब निवृत्त झाले आहेत, हे नवीन साहेब आहेत हा तपशील गुरुजींच्या ध्यानात येत नव्हता, पण सोसायटीचे सेक्रेटरी स्वत: आपल्या दारात आले आहेत हे मात्र त्यांना उमगत होते.

संस्थेला अजून खूप पल्ला गाठायचा होता. बोर्डी परिसरात अजून विज्ञान शाखेचे पदवी महाविद्यालय नव्हते. डिग्रीसाठी जवळचे सायन्स कॉलेज पालघरला – बोर्डीहून अजून पन्नास किलोमीटरवर होते. इतक्या दूर मुला मुलींना शिकायला पाठवायला अडाणी अशिक्षित पालक तयार नसत. जो भरवसा; जो विश्वास त्यांना गोखले एज्युकेशन सोसायटीवर होता तो त्यांना या दूरच्या कॉलेजबद्दल नव्हता. पण यामुळे अनेक मुला-मुलींची शिक्षणं बाराव्वीतच संपत. पुढील शिक्षणापासून ते वंचित रहात. ग्रामीण आदिवासी क्षेत्रातून आलेले हे बहुतेक सर्व विद्यार्थी-विद्यार्थिनी first generation learner होते. त्यांचे आई वडिल अशिक्षित / अल्प शिक्षित होते. मुलांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी ते गोखले एज्युकेशन सोसायटीकडे मोठ्या आशेने पहात होते.

करायचं खूप होतं, पण आर्थिक चणचण होती. सायन्स कॉलेजसाठी निदान ३०-४० लाख रुपयांची गरज होती. थोडीफार देणगी उभी रहात होती पण अपेक्षित रकमेच्या पासंगालाही तेवढे पैसे पुरत नव्हते. निदान काही खोल्या बांधून एखाद्या पदवी अभ्यासक्रमाचे तरी कॉलेज सुरू करता आले तर हवे होते.

सेक्रेटरी साहेबांच्या मनात क्षणार्धात हे सगळे विचार येऊन गेले पण आपण एका निवृत्त शिक्षकाच्या घरी आहोत याचे त्यांना भान होते. त्यामुळे अगदी थोडक्यात त्यांनी गुरुजींना सोसायटीच्या पुढच्या वाटचालीची – ध्येयधोरणांची कल्पना दिली. गुरुजींना आतपर्यंत काय पोचलं; किती पोचलं कळलं नाही, सेक्रेटरी साहेब स्वत: आपल्या घरी आले यातच ते कृतकृत्य झाले होते.

काही दिवसांनंतरची गोष्ट. झोनल सेक्रेटरी मेहता गुरुजींच्या प्रकृतीची विचारपूस करायला त्यांच्या घरी गेले होते. गुरुजी कमालीचे अशक्त झाले होते, बोलताही येत नव्हतं त्यांना. गुरुजींनी एक पाटी मागवून त्यांच्या मातृभाषेत – गुजरातीत – तमारू काम थई गयू – तुमचं काम झालं – असे लिहून दाखवले. सरांना काही रेफरन्स लागला नाही.

त्याच्या दुसऱ्या दिवशी, झोनल सेक्रेटरी आपल्या ऑफिसमध्ये बसले होते, शिपायाने निरोप आणला – वलवाड्याहून मेहता गुरुजींची मुले आली आहेत.

तीन मुलगे व एक मुलगी – चेहऱ्यावर अतिशय कृतज्ञता भावाने आत आले.

“सर, तुम्ही सेक्रेटरी साहेबांना घेऊन आमच्या घरी आलात, आम्ही आपले खूप आभारी आहोत. गुरुजी तर अजून त्याच धुंदीत आहेत. आपण संस्थेच्या सायन्स कॉलेजच्या स्वप्नाविषयी सांगत होतात. गुरुजींच्यातर्फे आम्ही एक छोटी भेट आणली आहे त्याचा स्वीकार करावा. “

झोनल सेक्रेटरी सरांनी पाकिट उघडून बघितले – त्या पाकिटात चाळीस लाख रुपयांचा एक चेक होता आणि समुद्राभिमुख अशा एका सुंदर इमारतीचा – ज्यात एक मोठा हॉल, क्लासरूम्स / वर्ग, प्रयोगशाळा, ऑफिस, असा सहा सात डिपार्टमेंटसना पुरेल अशा रचनेचा आराखडा होता. “सर, आपल्या कॉलेजसाठी चालेल ना हे डिझाईन? “

झोनल सेक्रेटरी सर स्तब्ध झाले. कविवर्य विं दा करंदीकरांच्या ओळी त्यांना आठवल्या –

देणाऱ्याने देत जावे,

घेणाऱ्याने घेत जावे.

घेता घेता एक दिवस

देणाऱ्याचे हात घ्यावे.

— —

१९९४

मार्च महिना – वृद्धापकाळाने जराजर्जर झालेले मेहता गुरुजी आज पुन्हा बोर्डीच्या समुद्रकिनारी आले होते. संस्थेच्या कॉलेजच्या भुमीपूजन समारोहासाठी – झोनल सेक्रेटरींना त्यांनी जे लिहून दिलं होतं – तुमचं कॉलेजचं काम नक्की होणार – ते प्रत्यक्षात उतरवण्यासाठी.

दुर्दैवाने भुमीपूजनानंतर थोड्याच दिवसांत गुरुजींनी देह ठेवला पण त्यांच्या मुलांनी ती वास्तू मोठ्या दिमाखात उभारून वडिलांचे नाव अजरामर केले.

— —

२०१९ – २०२०

१९९४ साली स्थापन झालेल्या बोर्डीच्या गोखले एज्युकेशन सोसायटीच्या N B Mehta (Valwada) Science College चे रजत जयंती वर्ष आहे.

नैसर्गिक उजेड, समुद्राची साद, नारळीची झाडे अशा सोबतीने ३६० विद्यार्थ्यांसह single faculty असे मुंबई विद्यापीठाच्या अंतर्गत असलेल्या या कॉलेजमध्ये आता १५०० च्या जवळपास विद्यार्थी शिकत आहेत. कॉलेजमध्ये विविध विषयांत पदवी; पद्व्युत्तर शिक्षणतर आहेच पण दोन विषयांत PhD संशोधनासाठी मान्यताही मिळालेली आहे. आत्तापर्यंतच्या प्रवासात कॉलेजला महाराष्ट्र शासनातर्फे “जागर जाणिवांचा” हे जिल्हा स्तरावरील पारितोषिक व २०१२ साली मुंबई विद्यापीठाचा Best College – Rural अशा पुरस्कारांनी सन्मानित केले गेले आहे.

मेहता कुटुंबियांनी लावलेल्या इवल्याशा रोपाचा छान वटवृक्ष होत आहे आणि सावित्रीच्या लेकींना आणि लेकांना आता शिक्षणासाठी दूरवर पायपीट करावी लागत नाहीये.

 

© डॉ मकरंद पिंपुटकर

चिंचवड

मो ८६९८०५३२१५   

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ “डिलिव्हरी बॉय!!!” – भाग ३ ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

डॉ अभिजीत सोनवणे

© doctorforbeggars 

? मनमंजुषेतून ?

☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ “डिलिव्हरी बॉय!!!” – भाग ३ ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

(सर्व काही असूनही काही लोक आनंदी नसतात, तर काहीच नसताना आजी समाधानी होती…!

ही टपरी म्हणजे तिचे शॉप होते…) 

इथून पुढे – – – 

या टपरीकडे पाहण्याचा आता माझा सुद्धा दृष्टीकोन बदलला… आता मलाही ते शॉपच वाटू लागले… दृष्टिकोनाचा फरक…!

चार काठ्यांपैकी, लहान बाळाच्या डोक्यावरून फिरवतात तसा हात त्यातल्या एका काठी वरून फिरवत ती म्हणाली, ‘इतकी वर्ष साथ दिली रे यांनी… यांना तू फेकायचं म्हणतोस…? ‘

या चार काठ्यांचे ऋण कसे फेडायचे? आधी फुटपाथ वर उघड्यावर राहत होते. घरातल्यांनी डोक्यावरचं छप्पर काढलं, पण याच चार बांबूंनी सावली दिली…

मी इथल्या लोकांना सांगून ठेवलं आहे, जेव्हा मी मरेन त्यावेळी तिरडी बांधताना याच चार बांबूंसह मला जाळा…!

माझ्या अंगावर काटा आला.

कृतज्ञता असावी तर अशी…

आजीची या कृतज्ञतेची भावना इतकी तीव्र आणि तीक्ष्ण होती की निर्जीव काट्यांना सुद्धा ती समजली असावी…

का कोण जाणे दर वेळी आलो की या काठ्या मला कायम झुकलेल्या दिसतात…!

तरीही अवसान आणून मी म्हणालो, ‘मी जिथे काम करतो तिथला साहेब चांगला आहे, मला तो बिनव्याजी कर्ज देईल, आपण हळूहळू कर्ज फेडू साहेबाचे… बघ तुझा फायदा होईल… आता आहे त्यापेक्षा आणखी जास्त सुख मिळेल…

मी खडा टाकत, चाचपडत, बुटाने जमीन टोकरत आजीशी खोटं बोललो…

कारण माझ्यातला भिक्षेकर्‍यांचा डॉक्टर काही माघार घेईना…!

वा रे वा तालेवार, आला मोठा कर्ज फेडणारा, असं म्हणून आजीनं छद्मीपणाने माझ्या तोंडासमोर गोल गोल हात फिरवला.

ती पुन्हा भाऊक झाली, तिच्या डोळ्यात पाण्याचे थेंब होते, ती म्हणाली, ‘ लेकरा या पांढऱ्या केसांनी आणि चेहऱ्यावरचे सुरकुत्यांनी जे मंत्र शिकवले ते आज तुला सांगते गाठ मारून ठेव’.

मी कान टवकारून ऐकायला लागलो 

खांद्यावर हात ठेवत ती म्हणाली, ‘आयुष्यभर कोणाच्यातरी ऋणात रहा, पण कोणाच्या कर्जात राहू नकोस’… बघ… अर्थ कळतोय का…?

‘आयुष्यात जगताना दूरदृष्टी ठेवून जगावं… बाळा, दूरचं बघता यावं म्हणून निसर्गानं आपल्याला डोळे कपाळावर दिले आहेत, नाहीतर अंगठ्यालाच दिले नसते का…? … बघ समजतंय का…?

तीचे डोळे आता शून्याकडे लागले होते…

“शून्यातच कदाचित तिचा भूतकाळ असावा… “

बाळा, तू त्या काठ्यांबद्दल बोललास, ‘ अरे एखादं झाड फळ देत नसलं म्हणून काय झालं, सावली तर देतच की… म्हाताऱ्या माणसाला चालताना आधार देते ती ही काठीच असते… आपण ऋणात राहायचं असतं त्या सावलीच्या, मिळालेल्या त्या आधाराच्या…!

आंबा खाऊन लोक कोय फेकतात, अरे या कोयी वरच तर सगळा गर असतो… आणि कोय म्हणजे तरी काय तर बीज रे… या बीजाला काहीच किंमत नसते का रे? ती आकाशाकडे पाहत म्हणाली.

हे वाक्य तिच्या वैयक्तिक आयुष्याशी निगडित होतं हे मला कळायला वेळ लागला नाही 

तु म्हणालास शॉप नीट केलं तर आणखी फायदा होईल, ‘पण बेटा कायम लक्षात ठेव फायदा हा कायम खाली असतो, म्हणून त्याला “उचलावं” लागतं… वाकावं लागतं… वाकलास की संपलास…!

‘अरे वाकायचं, पण त्यांच्यापुढे, जे आपल्यावर निस्वार्थ प्रेम करतात, जे आपलं शुभ व्हावं म्हणून आपल्या मागेपुढे शरीराने किंवा मनाने उभे असतात, त्यांच्यापुढे वाकायचं, नव्हे लोटांगण घालायचं… मग ते सजीव असोत का निर्जीव…! ‘

‘शुभचिंतक खूप असतात… परंतु एखाद्याचे शुभ होऊ नये म्हणून चिंता करणारेच जास्त असतात, हे कायम लक्षात ठेव बाळा’ 

अवाक होऊन मी हे सगळं ऐकत होतो…!

‘अश्रूंना काही किंमत नसते, किंमत असते अश्रू पुसणाऱ्याला… हा जो अश्रू पुसणारा आहे ना, त्याला देव समजायचं, आणि त्याच्यासमोर नतमस्तक व्हायचं बेटा’

मी नि:शब्द झालो, काय बोलावं मला पुढे कळेना.

शिक्षण फक्त वाचायला शिकवतं, आयुष्यात आलेले अनुभव जगायला शिकवतात हेच खरं…!

‘तू म्हणतोस शॉप आणखी मोठं करू, तुला सुख मिळेल… काही वर्षांनी वाटेल त्याला आणखी मोठं करू, हि महत्त्वाकांक्षा कधी संपणार आहे का…?

 सिकंदर सारखा सिकंदर, सुख शोधता शोधता शेवटी जाताना हाताच्या मुठी उघड्या ठेवून गेला, सर्व असूनही मी काहीही वर घेऊन चाललो नाही हे त्याला सांगायचं होतं, आपण कोण रे बेटा…?

सुख मानण्यावर असतं बेटा…

आधी रस्त्यावर उघड्यावर झोपत होते, मच्छर चावायचे, आता रस्त्यावरच मच्छरदाणी लावून झोपते, आता मच्छर चावत नाहीत हे सुख नाही का…?

पुर्वी इथपर्यंत येताना हातात सामानाचे डबे घेऊन चालत, उठत, बसत, कण्हत यायचे…

आता जोडलेले कितीतरी गिऱ्हाईक लोक मला रिक्षाने किंवा त्यांच्या मोटरसायकलीवर आजी आजी म्हणत जागेवर सोडतात… माझा त्रास किती कमी झाला…

हे सुख नाही का…?

डिलिव्हरी बॉय म्हणून काम करत असलेली पोरं रोज मला धंदा लावायला मदत करतात, माझं हे शॉप माझं नाही, ते त्यांचं समजतात हे सुख नाही का?

आई आजी काकू मावशी म्हणत रोज इथे लोक येतात, चार भिंतीच्या बाहेरही माझं एक कुटुंब आहे, हे सुख नाही का…?

माझ्या घरातल्या लोकांनी माझी जबाबदारी घेतली नाही, पण कोण कुठला तू गरिबा घरचा मुलगा… माझ्यासाठी तू कर्ज घ्यायला तयार झालास… हे सुख नाही का…?

बेटा सोन्या म्हणत इथल्या प्रत्येक माणसाला मी माझा मुलगा करून घेतला आहे, एकाच जन्मात इतक्या लोकांची आई होऊ शकले… हे सुख नाही का…?

अजून किती सुख मिळवायचं बेटा?

किती छोट्या छोट्या गोष्टीत आजी सुख शोधत होती.

सुखी माणसाचा सदराच आजीने माझ्या पुढे आणून ठेवला…

‘ बेटा कधीतरी कुठेतरी थांबावंच लागतं की, आयुष्यात पळताना ब्रेक कुठे लावायचं याचं भान राखता आलं पाहिजे सोन्या. नुसतं शिकलं म्हणून कोणी ज्ञानी होत नाही बेटा…

“काय करावं याचं भान म्हणजे ज्ञान… “

“आणि काय करू नये याचं ज्ञान म्हणजे भान… “

ऐकून मी स्तिमीत झालो…!

मी डॉक्टर, कधी काळचा अंतरराष्ट्रीय संस्थेचा महाराष्ट्र प्रमुख…

हि आजी रस्त्यावर वडापावची गाडी चालवते…

तरीही हुशार कोण शहाणं कोण यातला भेद आज समजला…

सुशिक्षित आणि सुसंस्कारित यामध्ये फरक असतो याची आजीने जाणीव करून दिली.

मी या माऊलीच्या पायाशी झुकलो, तिला नमस्कार केला.

खाली बसून मी वर तीच्या चेहऱ्याकडे पाहिले मला ती हिमालयाप्रमाणे उंचच उंच वाटली…!

मी तिला म्हणालो आजी तू हे शिकलीस कुठं…?

ती म्हणाली, पूर्वीच्या नववी पर्यंत माझं शिक्षण शाळेत झालं, थोडं वाचलं… बाकी जगाने न शिकवताच शिकवून दिलं…!

तोंडाला पदर लावत ती हसत म्हणाली.

पदराआडचं करुण हास्य बहुदा तिला मला दाखवायचं नसावं, मी समजून गेलो.

या स्वाभिमानी आजीला मी पुन्हा एकदा नमस्कार करून गाडीला किक मारली… तेवढ्यातूनही ती म्हणाली सांभाळून जा रे बेटा…!

यावेळी पाऊस नव्हता तरीही जुगलबंदी सुरू होती माझी आणि माझ्या डोळ्यांची…!

यानंतरही मी त्या बाजूला जायचो परंतु आजीच्या “शॉप” वर थांबायचो नाही, वडे करण्यात किंवा कोणाशी तरी बोलण्यात ती गुंग असायची.

मधल्या काळात मुद्दाम तिला भेटण्यासाठी चक्कर मारली, त्यावेळी आजीच्या शॉप ची जागा रिकामी होती.

मोटरसायकल थांबवून मी शेजारी आजी बद्दल विचारले, ते म्हणाले, ‘आजी गेली. ‘

कद्धी, मी जवळपास ओरडलो…

माझ्या पायाखालची जमीन सरकली…

तिथे छप्पर म्हणून असलेला फ्लेक्स नव्हता, फ्लेक्स ला टेकू देणाऱ्या त्या चारही काठ्या नव्हत्या…

अर्थातच त्यांची आहुती पडली असेल…

शॉप ओस पडले होते…

आजी, काकू, मावशी या शब्दांचा किलबिलाट तिथे नव्हता… झाडंच नाही तर पक्षी कुठून येणार…?

आता ती जाईल तिथे सोन्या बेटा म्हणत नवीन नाती निर्माण करेलच…

पण मी आणि माझ्यासारखे अनेक डिलिव्हरी बॉय पोरके झालो त्याचं काय…???

आजही मी त्या टपरीच्या / शॉपच्या रिकाम्या जागेभोवती फेऱ्या मारतो…

पण ती नसते… कुठेच नसते… कुठे कुठेही नसते…

तरीही काव काव करत मी घिरट्या मारत राहतो,

त्या जागेभोवती… पिंड शोधणाऱ्या त्या कावळ्यासारखा…!!!

– समाप्त –

© डॉ अभिजित सोनवणे

डाॕक्टर फाॕर बेगर्स, सोहम ट्रस्ट, पुणे

मो : 9822267357  ईमेल :  abhisoham17@gmail.com,

वेबसाइट :  www.sohamtrust.com  

Facebook : SOHAM TRUST

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “शहर बदलतंय, पण” ☆ श्री मंगेश मधुकर ☆

श्री मंगेश मधुकर

? मनमंजुषेतून ?

☆ “शहर बदलतंय, पण…” ☆ श्री मंगेश मधुकर

झालं असं की,

सकाळी रोजच्याप्रमाणे फिरणं झाल्यावर कट्ट्यावर गप्पांची मैफिल रंगलेली. राजकारण, टीव्ही सिरियल, क्रिकेट या नेहमीच्या विषयांवरुन चर्चेची गाडी बेफाम वाढणाऱ्या शहरांवर आली.

“आपलं शहरसुद्धा फार मोठं झालयं”

“मोठं???? चारही बाजूंनी बेसुमार वाढलयं. ”

“हो ना. कित्येक नवीन जागा तर माहितीही नाहीत. ”

“हे सगळं गेल्या वीस वर्षात घडलं”

“नवीन येतेय पण जुन्या वास्तु एकेक करून आठवणीत जातायेत. वाईट वाटतं. ”

“इट्स ओके, जे होतंय चांगल्यासाठीच होतंय. डोन्ट बी इमोशनल, ”डॅडींच्या बोलण्यानं वादाला तोंड फुटलं. स्वतःला आधुनिक विचारांचे समजणाऱ्या डॅडींचे टोकाचे विचार अनेकदा वादाचं कारण व्हायचे. आजही तेच झालं.

“फ्रेंडस जगा बरोबर बदलत रहा. बी प्रॅक्टिकल” डॅडी वदले.

“गपा हो, जेव्हा बघावं तेव्हा प्रॅक्टिकल, प्रॅक्टिकल जप करता. तुम्ही भावनाशून्य असलात तरी जग नाही”आप्पा एकदम उसळले.

“आप्पा, पर्सनल जायचं काम नाही. मी जनरल बोललो आणि मान्य करा किवा करू नका बदल होणारच. आठवणींचे कढ काढण्यापेक्षा नव्याबरोबर अडजेस्ट करणं हेच शहाणपणाचं आणि फायद्याचं होईल” डॅडी.

“या शहरात आयुष्य घालवलं. खूप बदल पाहिले, अनुभवले पण आताचा बदल फारच वेगळायं. ”आप्पा.

“वेगळा वगैरे काही नाही. आता आपलं शहर महानगर झालयं. माय डियर, धिस इज डेव्हलपमेंट, आय लाइक धिस ग्रोथ” बोलताना डॅडींच्या चेहऱ्यावर चमक होती.

“वी ऑल्सो लाइक ग्रोथ, बट अँट व्हॉट कॉस्ट”

“म्हणजे, समजलं नाही. ”डॅडी.

“खूप नवीन गोष्टी आल्या आणि अजूनही येतायेत. मोठाले रस्ते, अवाढव्य इमारती, शिक्षण संस्था, ब्रॅंडेड दुकानं, हॉटेल्स आणि आणखी बरंच काही.. ”

“मग चांगलचं आहे की… आरामदायी जगण्यासाठी हेच तर पाहिजे. ”

“फार एकांगी विचार करता. तुम्हांला मुद्दाच लक्षात येत नाहीये. ”आप्पा.

“ओके, समजावून सांगा. ” 

“नवीन शहरात आपलेपणा वाटत नाही. सगळं अनोळखी वाटतं. शोरूम आणि घर यात जो फरक आहे तोच.. ”

“म्हणजे”

“खूप चकचकीत, डोळे दिपवणारं शोरूम कितीही आकर्षक, चांगलं असलं तरी परकं वाटतं याउलट घराविषयी मात्र जिव्हाळा असतो. प्रेम असतं. ”

“यू आर राईट” डॅडी 

“आठवणींच्या ढिगाऱ्यावर उभं असणारं नवीन शहर खूप मोठं, आधुनिक, व्यवहारी आणि दिखाऊ आहे. आमच्यासारख्यांना अजूनही शहराविषयी प्रेम, अभिमान आहे पण आता “आपुलकी” मात्र वाटत नाही. ”आप्पा बोलायचे थांबले. कट्टयावर एकदम शांतता. आपल्या शहराविषयी वाटणारी परकेपणाची भावना ही प्रत्येकाचीच वेदना.

© श्री मंगेश मधुकर

मो. 98228 50034

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “समिधाच सख्या या!!” – लेख क्र. ११ ☆ प्रा.भारती जोगी ☆

प्रा.भारती जोगी

? इंद्रधनुष्य ?

☆ “समिधाच सख्या या!!” – लेख क्र. ११. ☆ प्रा.भारती जोगी ☆

” ओठांवर हसू म्हणजे येसू

 पावलात यश म्हणजे येसू!

आजपासून ही आमची येसूबाई! “

.. हे मोठ्या कौतुकाने उच्चारलेले गौरवोद्गार आहेत… दस्तुरखुद्द छत्रपती शिवाजी महाराजांचे! 

महाराज कोकण मोहिमेवर गेले असतांना, दक्षिण कोकणातील शृंगारपूर इथल्या पिलाजीराव शिर्के यांच्या भेटीचा योग आला. शिर्के घराणे धाडसी, पराक्रमी म्हणून प्रसिद्ध. त्यावेळी महाराजांच्या नजरेस पिलाजीरावांची कन्या राजाऊ उर्फ जिऊबाई पडली.

त्यांच्या नजरेनं ताडलं त्वरित की, आपल्या संभाजी राजे नावाच्या वादळाला हे तुफानच बांधू शकतं. त्यांनी लगेच तिचं येसूबाई हे नामकरण करून आमची म्हणत आपली स्नुषा म्हणून मान्यता देऊन टाकली.

त्यावेळी येसूबाई अवघ्या ६-७ वर्षे वयाच्या होत्या. पण मांसाहेब जिजाऊंच्या देखरेखीखाली अशा काही घडत गेल्या… जसं मुशीतून झळाळतं सोनं बाहेर यावं. मांसाहेबांचे सगळे गुण… माया, ममता निर्णयक्षमता, निरपेक्ष वृत्ती… सगळे उतरले त्यांच्यात. जिजाऊंची सावली, छबी म्हणत लोक!

येसूबाईंना जबाबदारीची समज त्यामुळे लहानपणीच आली. असं म्हणतात की, छोट्या येसू ने छत्रपती शिवाजी महाराजांना एकदा हातात तलवार घेऊन तलवार ही स्त्रीच आहे… हे सिद्ध करत… तलवारीला

जणू… नाक, नथ, नथनी, डोळे, नखं, गळा, कंठी फूल, मोगरा, पुतळा कटोरा, नखा, सुचिन्ह,… या सगळ्या आभूषणांनी मंडित दाखवून दिले आणि शेवटी तिची तेज धार दाखवत सूचित केले की, आभूषणांनी शृंगारलेली असली म्हणून तिला शोभेची बाहुली समजण्याची चूक कधीही करू नका. वेळ आली तर तिची धार तिचं शस्त्र बनून ती रणचंडी ही बनू शकते. येसू मधली राज्ञी आणि वीरांगना ही दोन्ही चकित करणारी पण महाराजांना अपेक्षित अशी रूपं बालपणीच निदर्शनास आली ती अशी! बालपणातील अवखळपणातलं ; करारीपण दिसलं आणि महाराज आपल्या अचूक आणि सुयोग्य निवडीवर संतोष पावले.

येसू जसजशी मोठी होत गेली, जाणीवा ही विस्तारत गेल्या तिच्या! तिला जाणवलं की तिची गाठ एका वादळाशी बांधली गेली आहे. म्हणूनच मग तिनेही या स्वराज्य रक्षक पतीच्या… संभाजी राजेंच्या या स्वराज्याच्या धगधगत्या होमकुंडात आपण ही एक समिधा होऊन समर्पित व्हावं असा निश्चय केला. बघता-बघता स्वराज्याचं कुलमुखत्यार पद बहाल झालं तिला. स्वराज्याची पहिली कुलमुखत्यार झाली ती! राजेंनी तिचा सन्मान म्हणून… तिच्या नावाची… तिच्या गुणविशेषांना अधोरेखित करणारी अशी राजमुद्रा असलेली शिक्के कट्यार दिली. त्यावर कोरलेले शब्द… श्री सखी राज्ञी जयती… खरंच त्या काळात एका कर्तबगार पतीचा, आपल्या पत्नीच्या कर्तबगारीवर असलेला ठाम, दृढ विश्वास नक्कीच लक्षणीय आणि विचारप्रवर्तक ठरावा!!

येसूबाई संभाजी राजेंची ख-या अर्थाने सहचरी, सोबती, सावली, सुकांता सिद्ध होतच गेल्या… प्रत्येक क्षणी, प्रत्येक प्रसंगात! अगदी खांद्याला खांदा लावून उभी रहात, सोबतीने आणि प्रसंगी एकटीने ही दमदार पावलांची साथ दिली या हिंदवी स्वराज्याच्या वाघिणी ने या वाघाला!!

अवघा २३ वर्षांचा संसार… त्यातही जोडीदाराच्या सतत सहवासाला मुकलेल्या येसूबाई… अगदी शांत स्थिर चित्ताने, स्थिर मतीने ठाम राहून राजेंच्या अनुपस्थितीत, ते स्वारीवर असतांना स्वराज्य सांभाळलं! एकही राजकारण शिजू दिलं नाही. प्रजेला अगदी लेकरासारखं सांभाळलं. पती जिवंत असतांनाही एकदा काही काळ छत्रपतींच्या सूचनेनुसार विधवेचं आयुष्य ही व्यतीत करणारी ही समिधा कणा-कणाने जळतच राहिली… समर्पित झाल्यानंतर तिचं स्वतः चं असं अस्तित्व उरलंच कुठे होतं ना! ती स्वराज्यरक्षक संभाजी राजेंची सच्ची सहधर्मचारिणी होती ना!!!!

संभाजीराजे औरंगजेबाच्या कैदेत गेल्यानंतर… त्यांना दिल्या जाणाऱ्या प्रत्येक जखमेच्या वेदनेची झळ, धग, थेट पोहोचत होती येसूबाईंच्या हृदयी! वेदनांच्या विचारांनी रक्तबंबाळ होत, होरपळून निघायच्या त्या! पण तरीही आपल्या वेदनांचा, दु:खाचा बाजार नाहीच मांडला या राज्ञी ने… स्थितप्रज्ञ राहून राज्यकारभार चालवला. संभाजी राजे गेले… संपूर्ण राज्य सांभाळण्याची जबाबदारी आली.

… पण ही हिंदवी स्वराज्याची वाघीण डगमगली नाही. यावेळी स्वराज्यानं एक वेगळंच रूप पाहिलं येसूबाईंच!! त्यागमूर्ती!!! रायगडाला मुघलांचा वेढा पडला त्यावेळी ठरवलं असतं तर आपल्या पुत्राचा राज्याभिषेक करवला असता. पण येसूबाईंनी त्यावेळी जो दूरदर्शीपणा आणि धोरणीपणा दाखवला तो लक्षणीयच होता. त्यांनी पुत्र प्रेमापेक्षा, स्वराज्य प्रेमाला प्राधान्य दिले. आणि आपले दीर, राजाराम महाराज यांना गादीवर बसवले आणि इतर सगळ्यांना राजाराम महाराजांना घेऊन जिंजीला रवाना केले. राजाराम महाराज सुरक्षित राहिले तरच स्वराज्य जिवंत राहील हे त्यांनी ओळखले होते. दोन्ही वारस एकाच वेळी हाती लागू नये ही येसूबाईंची मुत्सद्देगिरी!! .

स्वराज्य राखण्यासाठी.. ८-९ महिने एकटीच स्त्री किल्ला लढवत होती. जयती राज्ञी च्या रूपात जणू स्वतः ला सिद्ध करत… राजमुद्रा सजीव, बोलकी करू पहात होत्या येसूबाई!!

.. पण हाय रे दैवा… फितुरीचा शाप नडलाच नेहमीप्रमाणे! आणि येसूबाई आणि शाहू राजे दोघांना औरंगजेबाच्या कैदेत जावे लागले. पण कैदेत ही येसूबाईतल्या मातेने आपल्या शाहूवर, राजधर्म, राज संस्कार आणि मराठी संस्कृतीचे संस्कार केले. जणू त्याच्या भविष्यातील राजेपदाची ही रुजवणच होती!

थोडी थोडकी नाहीच ना… तब्बल २९ वर्षे ८ महिन्यांची कैद भोगावी लागली असं म्हणतात. म्हणजे अर्ध आयुष्य आणि ७ वर्षांच्या शाहू राजेंचा ही उमेदीचा काळ कैदेतच गेला. पण येसूबाई कशा राहिल्या, त्यांनी हा एवढा मोठ्ठा प्रदीर्घ काळ कसा कंठला असेल… इतिहासाने येसूबाईंच्या एवढ्या लक्षणीय, नजरेत भरणा-या योगदानाची योग्य अशी, म्हणावी तशी आणि म्हणावी तितकी नोंदही घेतली नाही. त्यांच्या समाधी जवळ… नाही चिरा नाही पणती!!

जवळपास ३० वर्षांचा वनवास… चार भिंतीत… परकीयांच्या कैदेत… ७ वर्षांच्या लेकरासोबत… पती शिवाय… पण… तिच्या या वेदना, विरह, व्यथा… संसार आणि स्वराज्य पेलून धरण्याचं असिधारा व्रत… या सगळ्यांकडे डोळेझाक केली गेली की काय? असाच प्रश्न पडतो.

या समिधेचं समर्पण, जळत रहाणं… राख होईपर्यंत… खरंच… तेथे कर माझे जुळ*!!

– लेख क्र. ११  .

© प्रा.भारती जोगी

पुणे.

 फोन नंबर..९४२३९४१०२४.

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ घर – उतारवयातील आर्थिक भागीदार…  – लेखक : श्री मंदार जोग ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

? इंद्रधनुष्य ?

☆ घर – उतारवयातील आर्थिक भागीदार…  – लेखक : श्री मंदार जोग ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित

पुण्यात राहणारे देशमुख काका आणि काकू. वय अनुक्रमे ६५ आणि ५८. आज त्यांच्या कोथरूडमधील फ्लॅटची किंमत जवळपास ३ कोटी रुपये आहे. पण हा फ्लॅट त्यांना आयता मिळालेला नाही. चाळिशीत असताना त्यांनी Home Loan घेतल, अनेक वर्षे EMI भरले, काटकसर केली आणि शेवटी हे घर स्वतःच्या मालकीचं केलं. मुलगा अमेरिकेत स्थायिक आहे, मुलगी बंगळुरूत. दोघेही सुखात आहेत. पण देशमुख दांपत्यासमोर एक प्रश्न उभा राहिला आहे. घर आहे, पण नियमित उत्पन्न नाही. FD वरील व्याज कमी पडू लागलं आहे. वाढते वैद्यकीय खर्च आहेत. मुलांकडे मागायचे नाही आणि आयुष्याच्या या टप्प्यावर पैशांची चिंता करत बसायचं नाही. अशा वेळी त्यांना ” रिव्हर्स मॉर्गेज ” या योजनेची माहिती मिळाली आणि त्यांना जाणवलं की आयुष्यभर ज्यासाठी कष्ट केले, ते घरच आता त्यांच्यासाठी काम करू शकतं.

सामान्य माणसाने घराला नेहमी संपत्तीपेक्षा जास्त काहीतरी मानलं आहे. ते फक्त चार भिंतीचं बांधकाम नसतं. त्यात आयुष्याची कमाई, आठवणी, त्याग आणि स्वप्न गुंतलेली असतात. म्हणूनच “घरावर कर्ज” हे शब्द ऐकले की अनेक ज्येष्ठ नागरिक घाबरतात. पण रिव्हर्स मॉर्गेज हे नेहमीच्या कर्जासारखं नाही. यात घर विकावं लागत नाही, घर सोडावं लागत नाही आणि मालकीही तुमच्याच नावावर राहते. उलट तुम्ही ज्या घरात राहता, तेच घर तुमच्या उत्पन्नाचा स्रोत बनतं. विशेषतः ज्यांना पेन्शन नाही, ज्यांची बचत कमी पडू लागली आहे किंवा ज्यांना मुलांवर आर्थिकदृष्ट्या अवलंबून राहायचं नाही, त्यांच्यासाठी ही योजना महत्त्वाची ठरू शकते.

रिव्हर्स मॉर्गेजमध्ये तुम्ही तुमचं स्वतःचं राहतं घर बँकेकडे तारण ठेवता आणि बँक तुम्हालाच दरमहा पैसे देते. साधारणपणे ६० वर्षांवरील व्यक्ती यासाठी पात्र असतात. पती-पत्नी संयुक्त अर्जदार असू शकतात. घराची मालकी मात्र तुमच्याच नावावर राहते. देशमुख काकांच्या ३ कोटी रुपयांच्या घराचं उदाहरण घेतलं तर बँक साधारणपणे घराच्या किमतीच्या ४० ते ६० टक्के मूल्य विचारात घेते. म्हणजे सुमारे १. २ ते १. ८ कोटी रुपयांच्या आधारावर त्यांना योजना मिळू शकते. प्रत्यक्ष मासिक रक्कम, बँक व्याजदर, वय आणि योजनेच्या अटींवर अवलंबून असते. पण अशा मूल्याच्या मालमत्तेवर साधारणपणे दरमहा ५० हजार ते १ लाख रुपयांच्या आसपास मासिक उत्पन्न मिळू शकतं. काही घरांसाठी ते यापेक्षा कमी किंवा अधिकही असू शकतं. मुद्दा एवढाच की आयुष्यभर कष्टाने उभं केलेलं घर आता खर्चाचं ओझं न राहता उत्पन्नाचं साधन बनतं. त्यांना आता जगभर प्रवास करायचा असेल, चांगले उपचार घ्यायचे असतील किंवा फक्त निर्धास्तपणे जगायचं त्यांच्यासाठी देखील हा एक स्वतंत्र उत्पन्नाचा स्रोत तयार होतो.

या योजनेचा सर्वात मोठा फायदा म्हणजे तुम्ही तुमच्या घरातच राहू शकता. अनेक जण म्हणतात, “घर भाड्याने दिलं तर उत्पन्न मिळेल ना? ” पण जर तुमच्याकडे एकच घर असेल तर ते भाड्याने दिल्यानंतर स्वतः कुठे राहायचं हा प्रश्न उभा राहतो. मोठ्या शहरांमध्ये मिळणारं भाडं आणि स्वतः राहण्यासाठी द्यावं लागणारं भाडं यांचा हिशोब कधीच जुळत नाही. त्यामुळे एकच घर असलेल्या आणि त्याच घरात राहून उत्पन्न हवं असलेल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी रिव्हर्स मॉर्गेज हा अनेकदा अधिक व्यवहार्य पर्याय ठरतो. कारण घरही तुमच्याकडे राहते आणि त्यातून उत्पन्नही मिळतं.

खरं तर ही योजना काही विशिष्ट प्रकारच्या कुटुंबांसाठी अधिक उपयुक्त ठरू शकते. मुलबाळ नसलेली दांपत्य, फक्त मुली असलेले आणि त्या आपल्या संसारात स्थिरावलेल्या पालक, परदेशात किंवा दूरच्या शहरांत राहणारी मुलं असलेली कुटुंबं, तसेच म्हातारपणी कोणावर आर्थिकदृष्ट्या अवलंबून राहायचं नाही असं ठरवलेले ज्येष्ठ नागरिक, या सगळ्यांसाठी हा पर्याय गंभीरपणे विचार करण्यासारखा आहे. कारण सर्वांची मुलं आई वडिलांना टाकून देत नसले तरी प्रत्येकाला आईवडिलांना स्वतःच्या घरी नेता येत नाही. मुलांकडे हात पसारायला आई वडिलांना आवडत नाही. मग अशा वेळी आर्थिक स्वावलंबन हीच सर्वात मोठी सुरक्षितता ठरते.

समजा काही वर्षांनी देशमुख काकांचं निधन झालं तरी काकू संयुक्त अर्जदार असल्यामुळे त्या पुढेही आयुष्यभर त्या घरात राहू शकतात. बँक त्यांना बाहेर काढू शकत नाही. शिवाय योजनेच्या अटींनुसार त्यांना मिळणारी देयकेही सुरू राहू शकतात. त्यामुळे जोडीदार गेल्यानंतर अचानक आर्थिक आधार तुटत नाही. ही बाब विशेषतः एकट्या राहणाऱ्या ज्येष्ठ महिलांसाठी खूप महत्त्वाची आहे. पुढे काकूंचंही निधन झाल्यानंतर मुलांसमोर दोन पर्याय असतात. एक म्हणजे बँकेची थकबाकी भरून घर स्वतःकडे ठेवणं. दुसरा म्हणजे घर विकणं. समजा त्या वेळेस घराची किंमत ५ कोटी रुपये झाली आहे आणि रिव्हर्स मॉर्गेजमधून मिळालेली रक्कम व त्यावरील व्याज मिळून बँकेची एकूण थकबाकी २ कोटी रुपये झाली आहे. अशा वेळी घर विकल्यास सर्वप्रथम बँकेचे २ कोटी रुपये फेडले जातील आणि उर्वरित ३ कोटी रुपये वारसांना मिळतील. म्हणजे रिव्हर्स मॉर्गेज केल्यामुळे मुलांना काहीच मिळणार नाही असं नाही. उलट अनेकदा मालमत्तेच्या वाढलेल्या किमतीचा फायदा वारसांनाही मिळतो. जर वारसांना घर विकायचं नसेल, तर ते बँकेची थकबाकी भरून घर स्वतःच्या मालकीत ठेवू शकतात.

सिनियर सिटीझन ह्यात सहभागी झाल्यास काही घरांमध्ये वर्षातून एकदाच फोन करणारी मुलं, रिव्हर्स मॉर्गेजमधून आई-वडिलांना उत्पन्न सुरू झाल्यावर अचानक नियमित फोन करू लागतील, त्यांचं प्रेम उतू जाऊ लागेल! ह्यातील विनोद बाजूला ठेवला तर एक गोष्ट खरी आहे. ती म्हणजे म्हातारपणी सन्मानाने जगण्यासाठी पैशांची गरज असते आणि त्या पैशांसाठी मुलांकडे पहावं लागू नये असे प्रत्येकाला वाटत असत. त्यातून प्रत्येक मुलगा “वंशाचा दिवा” ठरेलच असं नाही. प्रत्येक मूल म्हातारपणी आई-वडिलांचा आधार बनेलच असंही नाही. पण आयुष्यभराच्या कष्टातून तुम्ही स्वतः उभं केलेलं तुमचं घर मात्र तुम्हाला कधीच सोडून जात नाही. गरज पडली तर रिव्हर्स मॉर्गेजच्या माध्यमातून तेच घर तुमच्या उतारवयाचा आर्थिक आधार बनू शकतं. आपणच तयार केलेल्या ॲसेटचा आपल्या हयातीत, ताठ मनानें जगायला पुरेपूर वापर करता येतो. अनेकांसाठी खरा प्रश्न “वंशाचा दिवा कोण? ” हा नसून “आयुष्यभर साथ कोण देणार? ” हा आहे. आणि त्याचं उत्तर अनेकदा आपल्या स्वतःच्या घरातच दडलंलेलं असतं. फक्त ते अनेकांना माहीत नसतं. म्हणून हा लेखन प्रपंच.

┉❀꧁꧂❀┉

लेखक : मंदार जोग

प्रस्तुती : सुहास रघुनाथ पंडित 

सांगली (महाराष्ट्र), मो – 9421225491

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “जूनचा पाऊस व –जून” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – शशी नाडकर्णी-नाईक ☆

शशी नाडकर्णी-नाईक

? वाचताना वेचलेले ?

☆ “जूनचा पाऊस व –जून” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – शशी नाडकर्णी-नाईक 

‘जून’ महिना संपत आला…

पण अ’जून’ पावसाचा पत्ता नाही…

असं वाटतं की भि’जून’जावं…

मो’जून’ दोन चार थेंब पडतात…

अंग भा’जून’ जातंय…

चेहरा कोमे’जून’ गेलाय…

कुठे   स’जून’ जाता येत नाही…

 

रात्री १२ वा’जून’ गेले तरी झोप  येत नाही..

 

अरे जरा त्या पावसाला सम’जून’ घ्याना.काँक्रिट जमिनीत विर’जून’ रस्ते करतात. नगरी redevelopment मुळे निळ्या प्लॅस्टिक आणि पत्र्यांनी स’जून’ गेली.

 पाणी जमिनीत  न जाता  ला’जून’   वरच राहतं.

सगळी सृष्टी भा’जून’ शि’जून’  कोमे’जून’ गेली. समुद्रात जायला पाणीच नाही.

मनुष्याचे कर्म फिरून त्यालाच फळ देते. ढग तरी कसे गर’जून’ (गर्जून )पडणार ?तो गरीब बिच्चारा पाऊस  येणार कोठून?

सगळे वातावरण प्रदूषणाने पिं’जून’ गेले आहे.

 

जीवन थि’जून’ गेलंय रे पावसा!

आता मा’जून’ जाऊ नकोस.

लवकर ये.

लेखक:अज्ञात

प्रस्तुती : सौ. शशी नाडकर्णी-नाईक

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆“निरोगी रहा ” – लेखक / लेखिका : वैद्य परीक्षित शेवडे / वैद्य स्वराली शेंड्ये ☆ परिचय – श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆

श्री हर्षल सुरेश भानुशाली

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ “निरोगी रहा ” – लेखक / लेखिका : वैद्य परीक्षित शेवडे / वैद्य स्वराली शेंड्ये ☆ परिचय –  श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆

पुस्तक : निरोगी रहा

लेखक: वैद्य परीक्षित शेवडे

 वैद्य स्वराली शेंडये

पृष्ठ: १२८

मूल्य: २२०₹ 

Prevention is better than cure म्हणजेच “आपण रोगाच्या प्रतिबंधाबाबत उपचारांपेक्षा अधिक सजग असायला हवं” हे आजच्या घडीला जगन्मान्य तत्त्व आहे. हा प्रतिबंध करण्याचा मार्ग म्हणजेच आयुर्वेदाने सांगितलेली दिनचर्या आणि ऋतुचर्या. या दोन्हींचं पालन आजच्या काळात कसं शक्य आहे, त्यातील तपशील, खाचखळगे यांसहच काही सोप्या पथ्याच्या रेसिपी, मानसिक आरोग्याची काळजी अशी पुरेपूर उपयुक्त माहिती असलेलं पुस्तक म्हणजे “निरोगी रहा” 

दैनंदिन जीवनात निरोगी आणि संतुलित राहण्यासाठी आयुर्वेदाच्या तत्त्वांवर आधारित मार्गदर्शन करणारे उपयुक्त पुस्तक. आधुनिक जीवनशैलीमुळे निर्माण होणाऱ्या विविध आरोग्य समस्यांवर सोप्या आणि व्यावहारिक पद्धतीने उपाय सांगण्यात आले आहेत.

या पुस्तकात आहार, दिनचर्या, मानसिक स्वास्थ्य, रोगप्रतिबंधक सवयी आणि नैसर्गिक आरोग्य व्यवस्थापन याविषयी सविस्तर माहिती दिली आहे. आयुर्वेदातील पारंपरिक ज्ञान आणि आजच्या जीवनशैलीचा समतोल साधणारे हे पुस्तक प्रत्येक कुटुंबासाठी उपयुक्त ठरेल.

पुस्तकातील वैशिष्ट्ये

— निरोगी जीवनशैलीसाठी आयुर्वेदिक मार्गदर्शन

— दैनंदिन आरोग्य टिप्स आणि सवयी

— मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्याविषयी माहिती सोपे, व्यावहारिक आणि प्रभावी उपाय

 

.. सर्व वयोगटांसाठी उपयुक्त मार्गदर्शक.

 

परिचय : श्री हर्षल सुरेश भानुशाली

पालघर 

मो. 9619800030

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ परिहार जी का साहित्यिक संसार # ३३८ ☆ व्यंग्य – ग़मे-इश्क और ग़मे-रोज़गार ☆ डॉ कुंदन सिंह परिहार ☆

डॉ कुंदन सिंह परिहार

(वरिष्ठतम साहित्यकार आदरणीय  डॉ  कुन्दन सिंह परिहार जी  का साहित्य विशेषकर व्यंग्य  एवं  लघुकथाएं  ई-अभिव्यक्ति  के माध्यम से काफी  पढ़ी  एवं  सराही जाती रही हैं।   हम  प्रति रविवार  उनके साप्ताहिक स्तम्भ – “परिहार जी का साहित्यिक संसार” शीर्षक  के अंतर्गत उनकी चुनिन्दा रचनाएँ आप तक पहुंचाते  रहते हैं।  डॉ कुंदन सिंह परिहार जी  की रचनाओं के पात्र  हमें हमारे आसपास ही दिख जाते हैं। कुछ पात्र तो अक्सर हमारे आसपास या गली मोहल्ले में ही नज़र आ जाते हैं।  उन पात्रों की वाक्पटुता और उनके हावभाव को डॉ परिहार जी उन्हीं की बोलचाल  की भाषा का प्रयोग करते हुए अपना साहित्यिक संसार रच डालते हैं।आज प्रस्तुत है आपका एक अप्रतिम एवं विचारणीय व्यंग्य – ‘ग़मे-इश्क और ग़मे-रोज़गार‘। इस अतिसुन्दर रचना के लिए डॉ परिहार जी की लेखनी को सादर नमन।)

☆ साप्ताहिक स्तम्भ – परिहार जी का साहित्यिक संसार  # ३३८ ☆

☆ व्यंग्य ☆ ग़मे-इश्क और ग़मे-रोज़गार ☆ डॉ कुंदन सिंह परिहार ☆

अमूमन आदमी ज़िंदगी में ग़मों से अपना दामन बचाना चाहता है, लेकिन शायरों और गीतकारों के लिए ‘ग़म’, ‘दर्द’ या ‘रंज’ बहुत अज़ीज़ होते हैं। उनकी नज़्मों और गीतों से लगता है कि ज़िंदगी में ग़म न हों तो ज़िंदगी बेरंग और बेलज्जत हो जाए। शायरों और गीतकारों के लिए ग़म ख़ूबसूरत भी है और ज़रूरी भी। हमारे प्रिय गायक मेंहदी हसन का नग़मा है— ‘तुम नहीं, ग़म नहीं, शराब नहीं; ऐसी तनहाई का जवाब नहीं।’ और तलत महमूद का वह मीठा गीत— ‘शुक्रिया अय प्यार तेरा, दिल को कितना ख़ूबसूरत ग़म दिया।’

यह ग़म या दर्द शायरों को बेतरह परेशान करता रहा है। न इसका कारण समझ में आता है न उपचार। प्रमाण के तौर पर ‘ग़ालिब’ को देखें— ‘दिले नादां तुझे हुआ क्या है, आख़िर इस दर्द की दवा क्या है?’

ज़ाहिर है कि यह ग़म या दर्द इश्क से पैदा होने वाला ग़म है, इसका ग़मे-रोज़गार से कोई ताल्लुक़ नहीं है। ग़मे-रोज़गार से उलट यह ग़म सुकून और चैन देने वाला होता है, इसीलिए शायर उससे निजात पाने की ख़्वाहिश नहीं रखता।

हालत यह होती है कि ग़म या दर्द ज़िंदगी का ज़रूरी हिस्सा बन जाते हैं। एक फिल्मी गीत का मुलाहिज़ा करें— ‘मुझे ग़म भी उनका अज़ीज़ है, कि उन्हीं की दी हुई चीज़ है; यही ग़म है अब मेरी ज़िंदगी, इसे कैसे दिल से जुदा करूं?’ यानी महबूबा को प्रेमी का दिया हुआ ग़म भी इतना प्यारा है कि उसे दिल से जुदा करना मुश्किल हो जाता है।

एक और गीत है— ‘तुम्हीं ने ग़म की दौलत दी,बड़ा एहसान फ़रमाया, ज़माने भर के आगे हाथ फैलाने कहां जाते?’ यानी, ग़म न हों तो उन्हें हासिल करने के लिए ज़माने के आगे हाथ फैलाने की नौबत आ सकती है।

एक और नायिका ग़मों से मिली समृद्धि से गदगद है— ‘दिल को दिये जो दाग़, जिगर को दिये जो दर्द, इन दौलतों से हमने ख़ज़ाने बना लिये।’ यानी, दूसरों के लिए भले ही ग़म या दर्द तक़लीफदेह हों, नायिका के लिए वे ख़ज़ाने से कम नहीं हैं।

दर्द की स्वाभाविकता के बारे में ‘ग़ालिब’ ने लिखा—‘दिल ही तो है, न संगो-ख़िश्त, दर्द से भर न आये क्यों; रोयेंगे हम हज़ार बार, कोई हमें सताये क्यों?’ और, ‘दर्द मिन्नतकशे दवा न हुआ, मैं न अच्छा हुआ बुरा न हुआ।’

मतलब यह कि मेरे दर्द का अच्छा न होना बेहतर है क्योंकि मुझे दवा का मोहताज नहीं होना पड़ा।

प्रेमी के प्रति नायिका का लगाव इस मयार का है कि नायिका प्रेमी से इल्तिजा करती है कि वह अपने दुख उसे देकर हल्का हो जाए। ‘तुम अपने रंजो ग़म, अपनी परेशानी मुझे दे दो।’ और, ‘अगर मुझसे मोहब्बत है, मुझे सब अपने ग़म दे दो।’ वैसे यह समझना मुश्किल है कि ग़मों का स्थानांतरण कैसे हो सकता है। ग़म अगर क़र्ज़-वर्ज़ का है तो बात अलहदा है।

हमारे शायरों ने ज़िंदगी में ग़म को बहुत तरजीह दी। ‘शकील’ साहब ने लिखा— ‘मेरी ज़िंदगी है ज़ालिम, तेरे ग़म से आशकारा। तेरा ग़म है दर हक़ीक़त, मुझे ज़िंदगी से प्यारा।’

एक दिलचस्प थियरी हमारे शायरों ने पेश की है जिस पर आज के औषधि-विशेषज्ञों को तवज्जो देना चाहिए। अनेक शायरों का मत है कि दर्द हद से गुज़र जाए तो ख़ुद ही दवा बन जाता है। ‘ग़ालिब’ ने लिखा—‘इशरते क़तरा है दरया में फ़ना हो जाना, दर्द का हद से गुज़रना है दवा हो जाना।’ दूसरी जगह वे लिखते हैं— ‘रंज से ख़ूगर हुआ इंसां तो मिट जाता है रंज, मुश्किलें मुझ पर पड़ीं इतनी कि आसां हो गयीं।’

शायर का मक़सद शायद यह है कि दर्द या ग़म के हद से गुजरने पर आदमी उसका आदी हो जाता है, जो बड़ी सीमा तक सच भी है। हरदिल अज़ीज़ गायक तलत महमूद के जिस गीत में ‘ख़ूबसूरत ग़म’ देने के लिए प्यार का शुक्रिया अदा किया गया है उसी में आगे गीतकार कहता है— ‘आंख को आंसू दिये जो मोतियों से कम नहीं, दिल को इतने ग़म दिये कि अब मुझे कोई ग़म नहीं।’

इसी तबियत के एक गीत की पंक्ति है— ‘ये दर्द दवा बन जाएगा, इक दिन जो पुराना हो जाए।’ लेकिन इस गीत के रचने वाले ने यह नहीं बताया कि दर्द से निजात देने वाला वह शुभ दिन कब आएगा।

शायर ‘जिगर’ मुरादाबादी एक कदम आगे बढ़ जाते हैं। उन्हें उनका दर्द मज़ा देने लगता है— ‘आदत के बाद दर्द भी देने लगा मज़ा, हंस हंस के आह आह किये जा रहा हूं मैं।’

एक दूसरी ग़ज़ल में, जिसे बेगम अख़्तर ने अपना ख़ूबसूरत स्वर दिया, ‘जिगर’ फ़रमाते हैं— ‘तबीयत इन दिनों बेगानए ग़म होती जाती है, मेरे हिस्से की गोया हर ख़ुशी कम होती जाती है।’ यानी ज़िंदगी में ग़म के न रहने से खुशियां भी घटती जाती हैं। गरज़ यह कि ख़ुशियां ग़मों पर ही मुनहसिर हैं।

‘ग़ालिब’ ने लिखा— ‘इश्क से तबीयत ने ज़ीस्त का मज़ा पाया, दर्द की दवा पायी दर्द बे-दवा पाया।’ यानी इश्क से ज़िंदगी का मज़ा भी मिला और दर्द की दवा और लाइलाज दर्द भी।

प्रेमी के लिए दर्दे-इश्क इतना ज़रूरी है कि सोये दर्द को जगाया जाता है— ‘जाग दर्दे इश्क जाग। दिल को बेक़रार कर, छेड़ के आंसुओं का राग।’

कहने की ज़रूरत नहीं कि यह ग़म और दर्द इश्के-मजाज़ी से पैदा होते हैं, इनका ताल्लुक़ ग़मे-रोज़गार से क़तई नहीं है। ग़मे- रोज़गार से यह ख़ूबसूरत और मीठा-मीठा दर्द हासिल होना मुमकिन नहीं है। ‘ग़ालिब’ ने लिखा कि किसी न किसी ग़म में मुब्तिला होना इंसान की फ़ितरत है—‘ग़मे इश्क गर न होता, ग़मे रोज़गार होता।’

ग़म को पालने-पोसने वाला क्लासिक पात्र मशहूर अंग्रेज़ उपन्यासकार चार्ल्स डिकेंस के उपन्यास ‘ग्रेट एक्सपेक्टेशंस’ में मिस हैविशाम के रूप में मिलता है। मिस हैविशाम का प्रेमी उन्हें धोखा देकर ठीक उस वक्त भाग जाता है जब वे शादी की पूरी तैयारियों के साथ उसका इंतज़ार कर रही थीं। उसके धोखे की ख़बर पाकर मिस हैविशाम ने समय को उसी क्षण पर रोक देने की कोशिश की। घर की घड़ियां उसी क्षण पर रोक दी गयीं, वे जीवन भर शादी की वही पोशाक पहने रहीं, शादी की केक पर मकड़जाले तन गये, एक जूता पैर में और एक मेज़ पर ही रहा। मिस हैविशाम चलता-फिरता म्यूज़ियम बन गयीं। लेकिन उनकी सारी कोशिशों के बावजूद वक्त उनकी बंद मुट्ठी से रिसता गया और धीरे-धीरे वे बूढ़ी हो गयीं।

—– 

© डॉ कुंदन सिंह परिहार

जबलपुर, मध्य प्रदेश

संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ ≈

Please share your Post !

Shares
1