मराठी साहित्य – कवितेच्या उत्सव ☆ जीवन कोडे… ☆ सौ. जयश्री पाटील ☆

सौ. जयश्री पाटील

 

? कवितेच्या उत्सव ?

☆ जीवन कोडे… ☆ सौ. जयश्री पाटील ☆

(वृत्त-पादाकुलक, बालानंद,  ८-८, ८-६ अर्ध समजाती)

थकली गात्रे उरला आता

आठवणींचा पाचोळा

त्याच्यासोबत हसणे रडणे

कातरवेळी विरंगुळा

अवघड होता प्रवास सारा

मुळीच नाही डगमगलो

यशकीर्तीचे इमले चढलो

आपदेतही ना खचलो

 *

कर्तव्यात ना कसूर केला

दिसही केला रात्रीचा

कष्टाला कुठे पर्याय होता

हिशेब नव्हता वेळेचा

 *

आपुलकीने जपली सारी

वीण मनोहर नात्यांची

सोबत आली काही तुटली

रक्ताची आणि प्रेमाची

 *

पक्षी उडाले घरट्या मधून

पंख घेऊन क्षमतेचे

अधीर होते मन व्याकुळते

कोडे जीवन मार्गाचे

 

© सौ. जयश्री पाटील

विजयनगर.सांगली.

मो.नं.:-8275592044

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – प्रतिमेच्या पलिकडले ☆ पाव मण लाकडे + संपादकीय निवेदन – श्री नंदकुमार पंडित वडेर – अभिनंदन ☆ सम्पादक मंडळ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

सूचना/Information 

(साहित्यिक एवं सांस्कृतिक समाचार)

☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

📚📖 अ भि नं द न 📖 📚

जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, सांगली यांनी आयोजित केलेल्या २०२५ च्या सांगली जिल्हा ग्रंथोत्सवात आपल्या समुहातील ज्येष्ठ साहित्यिक श्री नंदकुमार पंडित वडेर यांना सुजाण वाचक सन्मानपत्र बहाल करण्यात आले आहे.

श्री. वडेर यांचे ई-अभिव्यक्ती (मराठी) परिवारातर्फे मन: पूर्वक अभिनंदन आणि शुभेच्छा 💐

– संपादक मंडळ

ई अभिव्यक्ती मराठी

आजच्या अंकात वाचूया त्यांचे एक आलेख – “पाव मण लाकडे…”

? प्रतिमेच्या पलिकडले ?

☆ # पाव मण लाकडे… # ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर 

“आता चुल पेटावयाला एक लाकूड शिल्लक नाही घरात.. स्वयंपाक, चहापाणी, आंघोळीचं गरम पाणी इतकी कामं कधीची खोळंबली आहेत.. चूलच पेटली नाही तर झाला की बट्ट्याबोळ… आणि मोळीवाल्याकडून जर जळणासाठी सरपणच मिळाले नाही तर काय मी आता या चुलीत माझी हाडं टाकावीत कि काय? तुम्ही त्या गॅस एजन्सी च्या दुकानात कामाला जाता आणि रोज शंभर घरा घरातून तो गॅसचा सिलेंडर पोहचता करता… त्यांच्या चुलीची एवढी काळजी घेता पण स्वत:च्या घरची काही काळजी असते का तुम्हाला? … त्या तुमच्या एजन्सी मालकाला सांगून एक गॅस कनेक्शन तरी आपल्य घरी आणायचं होतं तेव्हा… बाई गं सांगून सांगून थकले पण तुम्ही कसले जुन्या परंपरावादीला चिकटून बसलेले… श्रीमंतीचे चोचले गरीबांना परवडणारे नसतात आणि आधुनिक सोयी सुविधांच्या विरोधात कायम तुम्ही उभे… बाकीचे तुमचे सहकारी बघा. टू व्हिलर वरून सगळीकडे गॅस पोहचवतात आणि तुम्ही अजूनही त्या बाबा आदम च्या जमान्यातील जुन्या एटलास सायकल वरून पायाचे तुकडे पर्यंत पॅडल मार मारून एकेक गॅस सिलेंडर पोहचवत राहता.. अश्या दगदगीने किती थकून जायला होतयं तुम्हाला… आम्ही घरातली माणसं तुम्हाला दाताच्या कण्या करून सांगून थकलो पण तुम्ही काही बदलायला तयार नाही… तुमचं आपलं संत तुकारामांच्या सारखं एकच पालुपद.. सगळ्यांच्या भुका भागविण्यासाठी आपण कष्ट घेतले तर त्याचं मोठं पुण्य मिळतं.. भुकेलेल्याला अन्नदान केल्यासारखे… पण त्याची त्यांना त्यावेळी काही होती का कदर… सिंलेडरची डिलिव्हरी करणारा दारात दिसला रे दिसला तर त्याच्यावरच तोंडसुख घ्यायला तयार… काय तर गॅस नोंदवून महिना उलटून गेला आणि आता आणताय होय… काहीतरी मध्ये बरेच काळाबाजार करून वरकड कमाई झाल्यावर तुम्ही नंबराचा द्यायला आलात… आणि आता वर ‘चायपानीची’ अपेक्षा ही असणारच… इकडे आमच्या घरात पोरंबाळं, म्हातारे कोतारे भूकबळीचं तेव्हढे होयाचे राहिले होते… दिवसभर सारखी अशी पळापळ करून सगळ्यांना जर गॅस डिलीवरी वेळ द्यायला काय होतं तुमचं… पण तुमचे नखरे फार वाढलेत… जो वरती ज्यादा ची चिरीमिरी देतो त्याच्या दारी पहिला गॅस जातो… हो का नाही.. अशी शिव्याशापाची बिना कारणाची बोलणी खाऊन मन तुमचं खट्टू होतं. तरीही तुम्ही तुमचं कर्तव्य करायचं सोडत नाही…

आणि आता तर ते आखाती युद्धाचा भडका उडाला. त्यात तेल गॅसचा पुरवठ्यावर बंधन आल्यावर दिस ताच इकडे नफेखोरी करणारी सगळी सावजं मंडळीनीं परिस्थितीचा फायदा उचलला नाही तरच नवल… पांढरे बगळे नि खाकी ससाणे बेरक्या जातीची. स्वार्थ नि संधीसाधू गिधाडे सामान्य जनतेला ओरबाडून खायला बसली नाही तरच नवल.. याने त्याच्या नावाने बोंब मारायची आणि त्याने याच्या. तेही फक्त मिडीयासमोर… आणि गरीब बिचारा तो गॅस डिलिव्हरी करणारा मात्र सगळ्यांच्या रोषाला सामोरा गेल्याने उद्रेकाचा बळी होतो… त्याला वेठीस धरून काय साधणार म्हणा.. तो पोटार्थी प्रापंचिक माणूस… लोकांच्या झुंबडी त्या गॅस च्या दुकानी बसते.. मला पाहिजे गॅस आधी अश्या हमरीतुमरी होतात.. डिलिव्हरी मॅनला मध्यला मध्ये चढ्या बक्षिसाची लालूच दाखवून तो गॅस आपल्या घराकडे पळवतात… तेव्हा इतर नाराज आपली निराशेची आरोळी ठोकत राहतात.. पण त्या डिलिव्हरी मॅनचा एक माणूस म्हणून कोणीच कसला विचार करत नाहीत… तहानभूक विसरून तो एकटाच मात्र आपलं प्रामाणिकपणे देशसेवेचे कर्तव्य करतो…

आणि रात्री उशिरा ने जेव्हा तो आपल्या घराकडे निघतो तेव्हा त्याला आपलं घरदारं बायका पोरं सकाळ पासून उपाशी तपाशी राहून आपण वखारीतून पाव मण लाकडाची मोळी कधी घरी घेऊन येतोय याच्याकडे डोळे लावून वाट पाहत असलेले कोमेजलेले चेहरे दिसत असतात.. चारदोन रूपयाची वरकड कमाईतूंन त्यानं शेव फरसाणाचा पुडा सोबत घेतलेला असतो… त्यामुळे जरा तरी घरदार हसतं खेळतं राहील आणि ते बघून आजचा आपला थकवा दूर पळून जाईन… आजचा दिवस तर पार पडला… उद्याचं उद्या काय ते बघता येईल… ज्यानं चोच दिलीय त्यानं त्याच्या चाऱ्याची पण काही ना काही सोय केलेली असती.. तो काळजी घेणारा बसला असताना आपण का म्हणून काळजी करत बसायचं नाही का? हे वचन रोज रात्री झोपताना आपल्या कुटुंबाला ऐकवून दाखवलं कि त्याला शांत झोप लागते…

*

© नंदकुमार इंदिरा पंडित वडेर

विश्रामबाग, सांगली

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ मला समजलेली संत तुकारामांची गाथा…भाग – १२ ☆ सुश्री अरुणा मुल्हेरकर ☆

सुश्री अरुणा मुल्हेरकर

? विविधा ?

☆ मला समजलेली संत तुकारामांची गाथा… भाग – १२ ☆ सुश्री अरुणा मुल्हेरकर ☆

गाथेतून उमजणारी गीता (२)

सध्या आपण गाथेतून उमजणाऱ्या गीता तत्वाचे चिंतन करीत आहोत.

भगवंतांनी अर्जुनाला सांगितले की “करणारा तू कोण? नियतकर्माचे पालन करून तू ते कर्म कृष्णार्पण कर. कर्ता करविता हा एक भगवंतच आहे. हेच गीतेतले तत्त्व तुकाराम महाराज त्यांच्या अभंगातून भक्त जनांना सांगत आहेत. ते म्हणतात, “माझ्या वाणीतून अभंगांच्या रूपात जे बाहेर येते, ते सर्व बोल पांडुरंगाचेच आहेत. बोलविता धनी तोची आहे.”

ते म्हणतात,

झाली माझी वैखरी/ विश्वंभरी व्यापक/

मोकलीने जावे बाणे/ भाता जेने वाहिला/

आता येथे कैचा तुका/ बोले सिक्का स्वामींचा/

हे जे काही शब्द माझ्या मुखावाटे बाहेर पडत आहेत, ते माझे नसून मी तर स्वामींचा शिक्का आहे. ते माझ्याकडून वदवून घेत आहेत. भात्यातून बाण जसे बाहेर पडतात, त्याचप्रमाणे माझ्या मुखावाटे शब्द बाहेर पडतात इतकेच!

पिडलेती भ्रमे/ वाटा नकळती वर्मी/

 तुका म्हणे भार/ माथा टाका अहंकार//

हरीच्या भेटीची आस लागलेल्या भक्तांना

तुकाराम महाराज सांगतात की तुमच्या मनातील देहाच्या अहंकाराचा भार जेव्हा तुम्ही टाकाल, तेव्हाच तुम्हाला हरी भेटेल.

संत तुकारामांनी खालील अभंगात गीतेतून होणारा बोध भक्तांच्या निदर्शनास आणून दिला आहे.

काय दरा करील वन/ समाधान नाही जव/

(जोपर्यंत अंतःकरणात समाधान नाही, ते वासना शून्य झालेले नाही, तोपर्यंत रानात, गिरीकंदरात जाऊन तपश्चर्या करण्याचा काहीही उपयोग नाही.)

रीधता धावा पेवा मधी/ जोडे सिद्धी ते ठायी/

(धान्य काढण्याकरता पेवामध्ये घाईघाईने शिरले, तरी लगेच अन्न मिळेल का? )

काय भस्म करील राख/ अंतर पाख नाही तो/

(मुळात अंतकरण जर शुद्ध नसेल, तर अंगाला नुसती राख फासून काय उपयोग? )

वर्ण आश्रमाचे धर्म / जाती श्रम झालिया/

(वर्णाश्रम-धर्मानुसार विहित कर्म करण्याचा कंटाळा केला, तर ते कर्म वाया जाईल)

सर्व संतांना हेच सांगायचे आहे की कोणतेही कर्म उच्च किंवा नीच नसते. समाजाची घडी व्यवस्थित राहण्यासाठी खरंतर वर्णाश्रम धर्म रचना केली गेली. परंतु पुढे मात्र ब्राह्मण म्हणजे उच्च आणि शूद्र म्हणजे नीच अशी भावना लोकांच्या मनात विनाकारण निर्माण केली गेली.

गीतेत भगवंतांनी अर्जुनाला सांगितलेला कर्म संबंध विच्छेद या ठिकाणी तुकाराम महाराज साधकांना सांगत आहेत.

तेही नव्हे जे करिता काही/ ध्याता धाई तेही नव्हे/

तेही नव्हे जे जानवी जना/ वाटे मना तेही नव्हे/

त्रास मानिजे कांटाळा/ अशुभ वाचाळा तेही नव्हे/

तेही नव्हे जे भोवती भोववे/ नागवे धावे तेही नव्हे/

तुका म्हणे एकची आहे/ सहजी पाहे सहज/

 याचा अर्थ असा की, हे साधका तू जे काही करशील ती भक्ती नाही, कारण त्याचा कर्तेपणा तू तुझ्याकडे घेशील. ध्यान करणाऱ्याने मूर्ती समोर ठेवून जरी ध्यान केले, तरी ती भक्ती नाही, कारण त्यात तुझा अहंकार असेल. लोकांना परमार्थ समजावणे, मनाला जे वाटेल तीही भक्ती नव्हे. एकच तत्व महत्त्वाचे आहे, मुद्दाम ठरवून काहीही कर्म करण्याचा अभिमान स्वतःकडे न ठेवता तू जर सहजपणे पाहशील तर तीच खरी भक्ती होईल.

 हेच तत्व अधिक स्पष्ट करण्यासाठी तुकाराम महाराज दुसऱ्या अभंगात काय सांगतात ते आपण पाहू.

 जे जे जेथे पावे/ तेथे समर्पावे सेवे/

 सहज पूजा याची नावे/ गणित अभिमान/

 अवघे भोगिता गोसावी/ आधी अवसानि जीवी/

 तुका म्हणे सीण /न धरिता नवे भिन्न//

 जीवाने जर मी करणारा आणि मी भोगणारा

 असा अभिमान बाळगला नाही तर भगवंताशी द्वैत राहत नाही.

 

 विचारा वाचून/ न पाविजे समाधान/

 देह त्रिगुणांचा बांधा/ माजी नाही गुण सुधा

 देवाचिये चाडे/ देवा द्यावे जेजे घडे/

 तुका म्हणे होते/ बहु गोमटे उचिते//

 या ठिकाणी विवेकाविषयी महाराज जनसामान्यांना सांगत आहेत. ज्या ठिकाणी विचार नसेल, विवेक नसेल, त्या ठिकाणी समाधान प्राप्त होणार नाही. प्रपंच असार आहे आणि आत्माच सार तत्व आहे, असा विवेक झाल्याशिवाय संतोष तेथे नाही. त्रिगुणात्मक अशा या शरीरात कोणताच गुण परिपूर्ण नाही. म्हणून आपण केलेले कर्म हे कोणत्याही गुणांनी(सत्व, रज, तम) युक्त असले तरी ते देवालाच अर्पण करणे आवश्यक आहे. गीतेत भगवान हेच सांगतात की पार्थ, सर्व कर्म तू मला अर्पण कर.

क्रमशः… १ 

© सुश्री अरुणा मुल्हेरकर 

डेट्राॅईट (मिशिगन) यू.एस्.ए.

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ मैत्र जिवांचे… – भाग – २ ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆

सौ. पुष्पा चिंतामण जोशी

☆ जीवनरंग ☆

☆ मैत्र जिवांचे… – भाग – २ – ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆

(दहावीचा रिझल्ट लागण्यापूर्वीच सुरेखा विवाह बंधनात अडकली. तिच्या स्वप्नांची पूर्ती करण्यासाठी आपण काही मदत करू शकलो नाही याचं दुःख त्यावेळी आपल्या डोळ्यातून वाहत होतं.)

इथून पुढे – – 

बारावीच्या परीक्षेनंतर आपण ब्युटी पार्लरच्या कोर्स करीत होता तेव्हा सुरेखाच्या सासरी जाऊन तिची मॉ॑ तिला घेऊन आली. सुरेखाचा रसरशीत आनंदी चेहरा हरवून गेला होता. डोळ्यात कसलीही ओळख नव्हती. मागच्या दोन वर्षात तिची दोन ऍबॉर्शन्स झाली (की केली) होती. आता तिला तिसऱ्यांदा दिवस गेले होते. लाडक्या लेकीची अशी अवस्था पाहून खंतावून वडील देवाघरी गेले. सुरेखाची मॉ॑ मात्र मोठ्या धीराची. अनेक औषधोपचार करून तिने सुरेखाला सावरलं. जीवाचं बरं वाईट करायला निघाली सुरेखा हळूहळू लहानग्या सुरजमध्ये रमायला लागली. मुंबईत कामासाठी आलेला सुरेखा चा नवरा गावी गेला तो परत आलाच नाही. आता सुरेखा एका नर्सिंग ब्युरोतर्फे वृद्ध आजारी स्त्रियांची सेवा करण्याचं काम करते. लग्न होऊनसुद्धा सुख मिळेलच असं नाही. काय लिहिलं असेल आपल्या नशिबात? या विचाराने सोनल जागीच होती.

नाक्यावर चकाट्या पिटून, सिगारेटी फुंकून उशिराने घरात आलेला सुनील पाणी पिऊन झोपायला गेला तरी सोनल जागीच होती.

सुरेखाची नाईट ड्युटी होती म्हणून एक दिवस त्यांचं टिटवाळ्याला जायचं ठरवलं. गाडीच्या वेगाबरोबर त्यांच्या गप्पांचा वेगही वाढला. गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन झाल्यावर मी टिटवाळ्यायला एक छोटी जागा बुक केलीये त्या बिल्डिंगचं काम कुठपर्यंत आलाय ते बघून येऊया. तुला माहितीये माझी मॉ॑ मोठ्या जिद्दीची आहे. तिने आम्हाला कष्ट करायला शिकवले. मॉ॑चा आधार आहे म्हणून जमतय सारं. पण स्वतःच्या आणि सुरजच्या भविष्याचा विचार करायलाच पाहिजे…

गणपतीचे दर्शन घेऊन दोघी साईटच्या ठिकाणी गेल्या.

टिटवाळ्याच्या बिल्डरचा मॅनेजर मॉ॑चा गाववाला आहे. त्यांच्यामुळे थोडं लोन मिळालं. थोडे पैसे मॉ॑ने लोन म्हणून दिलेत. लोनचे हप्ते भरताना दमछाक होते. पण स्वतःसाठी, सुरजसाठी सारं सोसलंच पाहिजे.

किती लांब जागा आहे ग. इथून कशी तू तुझी ड्युटी करणार. ?॔

॓आपल्या बजेटमध्ये बसणारी जागा लांबच असणार.

॓ माझ्या व्यवसायाला आता वाढती मागणी आहे. तूसुद्धा लोन काढून इथे जागा घेतेस का? आपण दोघी मिळून इथे ब्युटी पार्लर आणि नर्सिंग ब्युरो काढू.॔

सोनलच्या मनात विचार गरगरू लागले. खरंच काय हरकत आहे जागेसाठी प्रयत्न करायला!

चाळीच्या दाराशी सुरज आईची वाट पाहत उभाच होता. त्याला प्रेमाने जवळ घेऊन सुरेखाने सोनलला अच्छा केलं.

विचारांच्या भोवऱ्यात गरगरताना आपण देखील जागा घेऊ शकतो का? प्रयत्न करायला काय हरकत आहे?

जिना चढून सोनल खोलीत शिरली. घरात काय झालंय हे कळल्यावर सोनलच्या पायाखालची जमीनच सरकली. आई ज्यांच्याकडे अनेक वर्ष काम करत होती त्याच घरात चोरी करण्याचा तिने प्रयत्न केला ते देखील बाबांच्या हट्टाला धमकावणीला बळी पडून. गदगदून रडणाऱ्याआईकडून ही हकीगत तुटक- तुटक ऐकताना त्यादिवशी आपण सुरेखाला भेटून घरी आलो होतो त्यावेळच्या आई पप्पांच्या बोलण्याचा अर्थ लक्षात आला. उमाताईंच्या घरी प्रामाणिकपणे आई अनेक वर्षे काम करते. उमाताई त्यांच्या प्रशस्त फ्लॅटमध्ये एकट्याच राहतात. त्यांच्या फ्लॅटची किल्ली साने वाहिनींकडे असायची. त्या आईला चांगल्या ओळखत असल्यामुळे शिवाय आई विश्वासू असल्यामुळे, त्यांनी आईला पुन्हा उमाताईंच्या फ्लॅटची चावी दिली. डुप्लिकेट किल्लीचा वापर करून आई त्यांच्या घरात शिरली. पण बाहेर गेलेल्या उमाताई बँकेची कागदपत्र विसरल्या म्हणून स्वतःजवळच्या किल्लीने दार उघडून अचानक आत आल्या आणि हा सगळा प्रकार उघडकीला आला. आई सर्वांच्या हाता पाया पडू लागली. नवऱ्याच्या दमदाटीमुळे मी हे केलं माझी चूक मला कबूल आहे. तुमच्या कशालाही हात लावायचा धीर मला झाला नाहीये. मला माफ करा. कामावरून काढा पण पोलिसात जाऊ नका. अशा गयावया केल्या. पण उमाताईंचा मुलगा आणि मुलगी पोलीस कम्प्लेंट करण्याच्या निर्णयावर ठाम होती.

॓फसले ग तुझ्या पप्पांच्या नादाने. मलाही मोह आवरता आला नाही. इतकी वर्ष कष्ट करून अब्रूने राहिले साऱ्याची माती झाली.॔ स्वतःच्या थोबाडीत मारून घेत वत्सलाबाई असहायपणे रडत बडबडत होत्या. सोनलचं काळीज गोठून गेलं होतं. उद्या सकाळी पोलीस दारात येणार या कल्पनेने घाबरून पप्पांनी दारूचा आधार घेतला व उशिरा घरी परतले. पण आता सुटका नाही या भावनेने सोनलला रडूसुद्धा फुटत नव्हतं. सकाळी कसंबसं आवरून खाल मानेने सोनल बाहेर पडली पण झालेला सगळा प्रकार डोळ्यापुढे नाचत होता. विचाराच्या तंद्रीत व लोकांच्या अविश्वासाच्या नजरांना सामोरे जात सोनल जिना उतरून रेल्वे प्लॅटफॉर्मवर आली. पण तितक्यात मागून आलेल्या सुरेखाने तिला घट्ट पकडून तिथल्या एका बाकावर बसवलं. तिला शांत करीत सुरेखा म्हणाली ॓आई वडिलांच्या चुकीचं फळ आपण कशाला भोगायचं? आपण आपली लढाई लढायची. एकदाच मिळणाऱ्या या आयुष्याला पाठ दाखवायची नाही.

सोनल तुला आत्तापर्यंत न सांगितलेली एक गोष्ट सांगते. माझ्या नवऱ्याने त्याच्या गावी एका मुलीशी केंव्हाच दुसरी शादी केली. त्यांना दोन मुलेही आहेत हे समजल्यावर देखील मी हिम्मत सोडली नाही. भाईच्या मदतीने मी इथे स्वतंत्र जागा घेतली. आशेचे धागे तुटून गेले असले तरी मी हिम्मत सोडली नाही. माझं आयुष्य मी सन्मानाने जगणार आहे. तुलाही तुझं आयुष्य संपविण्याचा अधिकार नाही. तू माझ्याबरोबर तिथे राहायला ये. आपण तिथे पार्लर आणि नर्सिंग ब्युरो चालू करू. माझी टिटवाळ्याची जागा सहा महिन्यात पूर्ण होईल. आता थोडी कळ काढ. चल्, आपण स्नेहा मॅडमकडे जाऊ. त्या नक्की तुझी बाजू समजून घेतील याची मला खात्री आहे.

नशिबावर मात करायला निघालेली त्या दोघींची पावलं एकमेकींच्या साथीने निश्चयाने पुढे पडत होती.

समाप्त –

© सौ. पुष्पा चिंतामन जोशी

कोथरूड, पुणे

मो ९९८७१५१८९०

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ …मग लेखणीच पाय बनली! ☆ श्री सचिन वसंत पाटील ☆

श्री सचिन वसंत पाटील

??

☆ …मग लेखणीच पाय बनली! ☆ श्री सचिन वसंत पाटील ☆

विसाव्या वर्षी अपघातामध्ये दोन्ही पायातली ताकद गमावली. त्यावेळेपासून चालणं फिरणं बंद झालं. वडिलांना वाचनाचा छंद होता. खूप कमी वयात चांगली पुस्तके वाचायला मिळाली. त्यातून ग्रामीण साहित्याची गोडी लागली. पुस्तकातील विचारांनी जगण्याची उमेद दिली. सकारात्मक दृष्टिकोन दिला. पाय चालत नाहीत म्हणून लेखणी हाती घेतली. मग वाट मिळाली. हळूहळू लेखणीच पाय बनली. सुरुवातीला मन रितं व्हावं म्हणून लिहीत होतो नंतर ग्रामीण माणसांच्या कथा-व्यथा लिहू लागलो.

सांगलीजवळच्या कर्नाळ या खेडेगावात लहानाचा मोठा झालो. माझ्या कथांचे नायक, नायिका या गावातील कष्टकरी, शेतकरी कुटुंबातील आहेत. त्यातील व्यथा-वेदना काल्पनिक नसून अवतीभवतीच्या व कृष्णाकाठच्या आहेत. हे सगळं अनुभूतीतून आलेलं वास्तवदर्शी लेखन आहे. असं जरी असले तरी या कथा लिहून मी काय फार मोठं काम केलं नाही. उलट मी ज्या शेतकरी कुटुंबात जन्मलो, ज्या मातेच्या पोटी जन्मलो, ज्या मातीतून उगवलो त्या मातीचे ऋण फेडण्यासाठी कर्तव्य भावनेतून मी लिहितो.

माझ्या ‘सांगावा’ या पहिल्याच कथासंग्रहातील बहुसंख्य कथा नातेसंबंधावर आधारित आहेत. जागतिकीकरण, खाजगीकरण, उदारीकरणामुळे नात्यामधील वाढलेलं अंतर, हरवलेलं प्रेम, जिव्हाळा, ओलावा, माणूसकी या कथांतून आली आहे. तर ‘अवकाळी विळखा’ या कथासंग्रहामध्ये प्रामुख्याने शेती-शेतकरी या विषयांशी संबंधित कथा आहेत. त्या मानाने पश्चिम महाराष्ट्रातील शेतकरी हा शेतीला पाणी असल्याने सुखी, संपन्न मानला जातो. परंतु या शेतकऱ्यांच्याही अनेक समस्या आहेत, त्यांचेही वेगवेगळे प्रश्न आहेत. ते शासनदरबारी मांडण्याचा, इतरांना सांगण्याचा प्रयत्न मी या कथांच्या माध्यमातून केला आहे. शेतकऱ्यांचे दु:ख, व्यथा-वेदनांबरोबरच काही प्रश्नांची सकारात्म उत्तरे शोधायचा प्रयत्न मी केला आहे.

गाव हा सगळ्यांच्याच आपुलकीचा, जिव्हाळ्याचा विषय असतो. आज गाव बदललंय, बदलतंय… गावावर ग्लोबल वॉर्मिंग, माॅल, ढाबा संस्कृती टी. व्ही. , मोबाईल अशी अनेक आक्रमणे आली आहेत. गावात अनेक सेवा, सुविधाही आल्या आहेत. गावातल्या अनेक परंपरा बंद पडल्या आहेत. जुनी अलुतेदारी-बलुतेदारी पार मोडीत निघाली आहे. झाडांची संख्या घटली आहे. देशी गाय, बैलजोडी, कावळे, चिमण्या दुर्मीळ झाल्या आहेत. पण हळूहळू माणूसही माणसांपासून दुरावतोय. मनामनातलं अंतर वाढतंय. भोवतालचं जग आभासी बनतंय. आपण करीत असलेली प्रगती पोकळ वाटतेय… तरीही ही सगळी आक्रमणे पचवून आज गाव कसं उभं आहे. हे गावातील बदल, गावातील अस्सल, इरसाल माणसं आणि जुना गावागाडा ‘गावठी गिच्चा’ या कथासंग्रहात आला आहे.

कथेबरोबरच ‘पाय आणि वाटा’ या नावाने माझा एक ललितसंग्रहही प्रसिद्ध झाला आहे. मला वीस वर्षे पाय होते आणि वीस बाबीस वर्षे मी पायांशिवाय जगलोय. पाय असण्यातलं सुख आणि पाय नसण्याचं दु:ख समान पातळीवर ठेवून हे लेखन करायचा प्रयत्न मी केला आहे. वीस वर्षे पायाने अनुभवलेल्या संवेदना या लेखनात एकवटलेल्या आहेत. त्याबरोबरच मराठी बोलीभाषा टिकल्या पाहिजेत तरच आपली संस्कृती टिकेल या भावनेतून मराठीतील दुर्मीळ बावीस बोलीतील बावीस कथांचे संपादन ‘मायबोली रंग कथांचे’ या अनोख्या पुस्तकात केले आहे. पुस्तके वाचल्यामुळे मी जिवंत राहिलो! लेखनामुळे प्रेरणा मिळाली. पुस्तकांचे, मायमराठीचे माझ्यावर अनंत उपकार आहेत. हे उपकारांची अल्पशी परतफेड या शब्दांची सेवा करून केला आहे.

माझ्या हालचालींना-लेखनाला मर्यादा आहेत. मला बसून लिहीता येत नाही. एका कुशीवर झोपून रोज दोन पाने मी लिहू शकतो. सातत्याने वीस-पंचवीस वर्षाच्या दीर्घ लेखनातून तीन कथासंग्रह प्रकाशित झाले. चांगला वाचक मिळण्याच्या बाबतीत मी नशीबवान आहे. पहिल्या ‘सांगावा’ या कथासंग्रहाच्या पाच आवृत्ती प्रकाशित झाल्या. महाराष्ट्र साहित्य परिषद, लोकनेते राजारामबापू पाटील पुरस्कारांसह अनेक पुरस्कार या संग्रहास मिळाले. तर ‘अवकाळी विळखा’ या कथासंग्रहाची तिसरी आवृत्ती नुकतीच प्रकाशित झाली आहे. त्यासही महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा, गुहागर, दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा, कोल्हापूर यांचा मानाचा कै. शंकर खंडू पाटील पुरस्कार, माणदेश साहित्य प्रतिष्ठानच्या पुरस्कारांसह अनेक पुरस्कार मिळाले आहेत. तसेच माझी कथा सावित्रीबाई फुले विद्यापीठ, पुणे बी. ए. भाग एक आणि संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या बी. काॅम. द्वितीय वर्षाच्या अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आली आहे, हा माझा सन्मान नसून मी करीत असलेल्या सेवेचा सन्मान आहे. माझ्या पुस्तकांवर मान्यवर समीक्षकांचे चार समीक्षाग्रंथ प्रसिद्ध झाले. अनेक मराठी अभ्यासकांनी राज्यस्तरीय, राष्ट्रीय स्तरांवर शोधनिबंध सादर केले असून एमफीएल, पीएचडी संशोधनासाठीही या साहित्याची निवड झाली आहे. तरीही मी माझ्या कथा लेखनावर अजिबात संतुष्ट नाही. मला सतत वाटत राहते, आपण आणखी चांगली कथा लिहिली पाहिजे.

*****

©  श्री सचिन वसंत पाटील

संपर्क – विजय भारत चौक, मु. पो. कर्नाळ, ता. मिरज जि. सांगली, पिन कोड ४१६ ३०४  मोबा. ८२७५३७७०४९.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ फुले वेचिता बहरू… ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्री विश्वास देशपांडे

??

☆ फुले वेचिता बहरू… ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

माझ्या बागेतल्या कुंदाच्या झाडावर सध्या एक अद्भुत दृश्य पाहायला मिळते आहे. कळ्यांनी लगडलेले झाड, शुभ्र फुलांनी भरून आलेले—जणू अंगणातच चांदणे उतरले. आरती प्रभू यांची एक सुंदर कविता आहे, समईच्या शुभ्र कळ्या. ही फुले म्हणजे जण समईच्या शुभ्र कळ्या असेच वाटले. किती फुले वेचली, तरी झाड बहरण्याचे थांबले नाही. त्याच्यावरच्या कळ्या उमलत राहिल्या. त्या क्षणी संत ज्ञानेश्वरांचा अभंग आठवला, “ फुले वेचिता बहरू कळियांसी आला ”. किती साध्या शब्दांत किती मोठे तत्त्व सांगून गेले आहेत ज्ञानेश्वरमाऊली!

प्रत्येक गोष्टीचा एक काळ असतो. मोगऱ्याची फुले उन्हाळ्यात येतात; उन्हाळ्यातच आंब्याला मोहर येतो आणि वातावरणात घमघमाट सुटतो. जणू संपूर्ण आसमंत सुगंधाने भरून जातो. तसाच कुंदालाही हिवाळ्यात बहर येतो आणि तो भरभरून फुलतो. निसर्ग प्रत्येक ऋतूमध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारे आनंद देत असतो—कधी सुगंधातून, कधी रंगांतून, तर कधी केवळ शांत सौंदर्यातून. फुलांना बहर, आंब्याला मोहर आणि हवेला सुगंध…! हे नक्षत्रांचे देणे, हे देवाघरचे देणे!

आपण अनेकदा देण्यात थांबतो. आता पुरेसे दिले, आता माझा वाटा संपला असे म्हणत. पण निसर्ग मात्र कधी थकत नाही. फुले वेचली तरी तो पुन्हा बहरतो. झाडावरून फुले काढली, तरी ते रुसत नाही; उलट नव्या कळ्यांना उमलण्याची संधी देते. देताना त्याला अपेक्षा नसते. नाही मोबदल्याची, नाही कौतुकाची. त्याशिवाय ते हातचं राखून देत नाही. आपली ओंजळ अपुरी पडते.

कुंदाला वास नसतो, असे आपण म्हणतो. पण खरंच नसतो का? की आपण वासाच्या शोधात असताना सौंदर्य पाहायचे विसरतो? शुभ्र पाकळ्या, नितळ रूप, साधेपणा—हे सारे पाहिले की मन आपोआप प्रसन्न होते. देवाला वाहिले तरी तो प्रश्न करत नाही, “ मला सुगंध का नाही? ” गजऱ्यात गुंफले, हार केला तरी फुले आढेवेढे घेत नाहीत. केवढी ही स्थितप्रज्ञता! हे शिकायला गीताच वाचली पाहिजे असे काही नाही. निसर्ग आपल्याला त्याच्या कृतीतूनही शिकवत असतो.

कुंदाच्या फुलांना त्यांच्या अस्तित्वातच समाधान असते. त्यांनी आपण जसे आहोत तसे स्वतःला स्वीकारलेले असते. मोगऱ्याच्या फुलांसारखा आपल्याला वास नाही म्हणून ते स्वतःला दुःखी करून घेत नाहीत. ते प्रसन्नच असतात नेहमी आणि त्यांच्याकडे मन भरून पाहणारा देखील प्रसन्न होतो. या फुलांकडून आपल्यालाही शिकायला मिळते. आपल्यात असलेले गुण, सौंदर्य, सामर्थ्य हे दाखवण्यासाठी गाजावाजा कुठे आवश्यक असतो? सुगंध नसला तरी चालतो, रूप नितळ असेल तर पुरेसे आहे. कुणी देवासाठी वापरले, कुणी सजावटीसाठी… फुलांचे काही म्हणणे नसते; आपण मात्र लगेच माझा वापर कसा केला गेला याचा हिशेब मांडायला लागतो.

कुंदाच्या झाडाकडे पाहताना वाटते, आपणही असेच असावे. कुणी आपल्याकडून घेतले तरी न रुसता पुन्हा पुन्हा द्यावे. कौतुक न झाले तरी बहरणारे. निसर्ग आपल्याला भरभरून देतो; आपण त्यातून प्रसन्नता घ्यायची की आपल्याच दुःखाला कवटाळून बसायचं हा आपला प्रश्न आहे.

अंगणातले ते शुभ्र चांदणे संध्याकाळपर्यंत मनात साठवून ठेवले. फुले सुकतील, गजरे विस्कटतील; पण त्या फुलांनी दिलेली शांती, प्रसन्नता मात्र टिकून राहील. आणि ती टिकवून ठेवणे आपल्यावर असते. आपलं आयुष्यही असंच असतं ना! थोडे देणे, थोडे बहरणे आणि उरलेल्या कळ्यांसाठी जागा ठेवणे!

© विश्वास देशपांडे

चाळीसगाव

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ।। श्री नारद उवाच ।। – नारद भक्ति सूत्रे —सूत्र ५४, ५५, ५६ ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ☆

श्री संदीप रामचंद्र सुंकले

? इंद्रधनुष्य ?

।। श्री नारद उवाच ।। – नारद भक्ति सूत्रे — सूत्र ५४, ५५, ५६ ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले 

।। श्री नारद उवाच ।। 

नारद भक्तिसूत्र ५४

गुणरहितं कामनारहितं प्रतिक्षणवर्धमानं|

अविच्छिन्नं सूक्ष्मतरं अनुभवरूपम् ||”

अर्थभगवंतावरील या प्रेमाला कोणतेही गुण नाहीत, त्यामध्ये कोणतीही वासना नाही, ते अखंड, अतिसूक्ष्म, प्रत्येक क्षणी वाढणारे, आणि केवळ अनुभवरूप आहे.

विवेचन:

नारद मुनी इथे आपला अनुभव सांगत आहेत. आपण इथे असे समजू की नारद मुनींनी भगवंतावर कसे प्रेम केलं असेल…

इथे नारद महर्षी आपल्याला सहा गुण अथवा प्रकार सांगत आहेत. त्यातील तीन हे थोडे नकारात्मक आणि तीन सकारात्मक आहेत. आधी नकारात्मक पाहू.

१. गुणरहित: 

सर्वसाधारण मनुष्य प्रेम करतो ते स्वार्थासाठी. स्वार्थाचा रंग वेगवेगळा असू शकतो. पण खरे अर्थात भगवंतावरील प्रेम हे निःस्वार्थ असते. त्याला सत्व, रज अथवा तम असा कोणताही गुणदोष चिकटत नाही. एका अर्थाने ते निर्गुण असते.

२. कामनारहितं: 

सामान्यतः कोणतीही गोष्ट करताना प्रत्येक मनुष्याच्या मनात काही विशिष्ट असा उद्देश असतो, कामना असते. कधी ती लौकिक असते तर कधी अलौकिक. कधी सकाम असते तर कधी निष्काम. पण खरा भक्त भगवंतावर अकारण प्रेम करीत असतो. अमुक व्हावे किंवा अमुक होऊ नये म्हणून तो काहीही करीत नसतो. तो फक्त प्रेम करीत असतो.

समर्थ रामदास याचे वर्णन पुढील प्रमाणे करतात – – 

“देवाचें जें मनोगत । तेंचि आपुलें उचित।

इच्छेसाठीं भगवंत । अंतरूं नये कीं ॥”

(दासबोध ०४. ०८. २२)

– – – जो भक्त आपल्या सर्व कामना /इच्छा भगवंताच्या इच्छेत मिसळतो तो खऱ्या अर्थाने मुक्त होतो.

३. अविच्छिन्नं:

आपण सर्वांनी आपल्या लहानपणी आईकडे हट्ट करून तेलाच्या डब्यातून तेल ओतून पाहण्याचा प्रयोग नक्की केला असेल. आपल्या एक गोष्ट लक्षात आली असेल की ती तैलधार अखंड असते. देवावर प्रेम करण्याची सवय लावून घ्यावी. सवय झाली की ज्याप्रमाणे वाहन चालवताना गप्पा मारता येतात, गाणी म्हणता येतात, तसे प्रपंच करता करता, प्रपंचाची स्थिती कशीही असली भगवंतावर त्याचे स्मरण ठेवून अखंड प्रेम करता येते.

४. अनुभवरूपम् 

आपण अनेक वेळा एक वाक्य ऐकतो. अमक्या मनुष्याचा मी चांगलाच अनुभव घेतला आहे. याचा व्यावहारीक अर्थ असा आहे की त्या माणसाने याला वाईट अनुभव दिला आहे. भगवंताच्या प्रेमाचा अनुभव अर्थात भगवंताचा अनुभव. त्याचा अनुभव घ्यायचा असेल तर त्याच्यासारखे व्हावं लागेल. किंवा त्याच्याशी तादात्म्य पावावे लागेल. संत तुकाराम महाराज आपल्या एका अभंगात म्हणतात,

“अणुरेणिया थोकडा | तुका आकाशा एवढा ||”

संत सोयराबाई म्हणतात,

“अवघा रंग एक झाला । रंगि रंगला श्रीरंग ॥”

५. सूक्ष्मतरं :

प्रेम जात्याच सूक्ष्म आहे. इथे नारदमहाराज सूक्ष्मतरं असे म्हणतात. आपली सूक्ष्मतेची व्याख्या आपल्या देहबुद्धीप्रमाणे असते. प्रेमाची अनुभूती सुद्धा अधिक सूक्ष्म असते. अशी अनेक उदाहरणे आहेत की भक्ताला कोणीतरी शारीरिक त्रास दिला आणि त्याचे वळ मात्र भगवंताच्या पाठीवर उठले. ज्ञाना नावाच्या रेड्याला पैठण येथे लोकांनी मारले आणि त्याचे वळ माउलींच्या अंगावर उठले. उदा. म्हणून आपण याचा आधार घ्यावा.

६. प्रतिक्षणवर्धमानं :

एखाद्या व्यक्तीवरील एखाद्या मनुष्याचे प्रेम ती व्यक्ती जिवंत असेपर्यंत किंवा त्या व्यक्तीचे सौंदर्य टिकेल तोपर्यंत असते, असे आपल्या लक्षात येते. भगवंत अमर आहे, त्यामुळे त्याच्यावरील केलेले प्रेम हे सुद्धा अमर होते. मीरा प्रेमात एवढी तल्लीन होऊन गेली (अर्थात तिचे प्रेम इतके वाढत गेले..) की समोर आणलेला विषाचा प्याला ठाकूरजींचा प्रसाद समजून तिने प्यायला आणि ती अमर झाली.

जय जय रघुवीर समर्थ 

– – – – 

नारद भक्ति सूत्रे ५५

तत्प्राप्य तदेवावलोकयति तदेव श्रृणोति

तदेव भाषयति तदेव चिंतयति ||”

अर्थ: या प्रेमाचा, अर्थात भागवतांच्या प्रेमाचा लाभ झाल्यावर तो सर्वत्र ते प्रेमच पाहतो. सर्वत्र ते प्रेमच ऐकतो. त्या प्रेमाबद्दलच बोलता आणि सर्वकाळ त्या प्रेमाचेच चिंतन करतो.

विवेचन: संत नामदेव महाराजांचा एक अभंग आहे. माझ्यामते तो या सूत्रांचे स्पष्टीकरण अधिक सुलभतेने करू शकेल…

“तीर्थ विठ्ठल । क्षेत्र विठ्ठल ॥ देव विठ्ठल । देवपूजा विठ्ठल ॥१॥ माता विठ्ठल । पिता विठ्ठल ॥ बंधु विठ्ठल । गोत्र विठ्ठल ॥२॥ गुरू विठ्ठल । गुरूदेवता विठ्ठल ॥ निधान विठ्ठल । निरंतर विठ्ठल ॥३॥ नामा म्हणे मज । विठ्ठल सापडला ॥ म्हणूनी कळीकाळा । पाड नाही ॥४॥”

– – भक्तिरसाने ओतप्रोत भरलेला हा अभंग म्हणजे नामदेवांच्या “नामभक्तिचे” एक उत्कृष्ट उदाहरणच म्हणावे लागेल. “चक्रवाक पक्षी वियोगे बाहती । जाहले मज प्रती तैसे आता ॥” असे म्हणणाऱ्या नामदेवांना जेव्हा विठ्ठल सापडला तेव्हा त्यांना जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी विठ्ठल दिसू लागला. खरं तर “तीर्थ” म्हणजे पाण्याने भरलेली अशी जागा जी सहज ओलांडता येईल. म्हणून चंद्रभागा नदी हे “तीर्थ” आणि त्याकाठी वसलेलं “पंढरपूर” हे “क्षेत्र” म्हणजे स्थान! नामदेवांसाठी हे तीर्थक्षेत्र विठ्ठलमय झाले. ह्या विठ्ठल नामाच्या गजरात “माझी भक्ती तुझी शक्ती एकरूप झाली” आणि म्हणून “देव विठ्ठल । देवपूजा विठ्ठल ॥. ” पुढे नामदेवांना माय, बाप, आप्त, इष्ट, गण, गोत, गुरू ह्या सगळ्यातच विठ्ठल दिसू लागतो आणि अखेर ते सुखाच्या परमोच्च बिंदूला जाऊन मिळतात, ते सुख जे ह्या मायिक विश्वाच्या अतीत आहे, जे कालातीत आहे आणि निरंतर आहे म्हणजेच “नामा म्हणे मज । विठ्ठल सापडला ॥”. त्या सुखाचं “निधान” म्हणजे साठाही विठ्ठलच आहे असे ते सांगतात. आता ह्या जागेला पोचल्यावर, विठ्ठलाशी एकरूप झाल्यावर मला मृत्यू जरी आला तरी त्याचे भय नाही.

नारद मुनी जी स्थिती सांगतात की भक्ति मार्गातील परमोच्च स्थिती आहे असे मला तर्काने वाटते. यानंतर काही मिळवायचे असेल किंवा मिळवायची इच्छा राहील असे वाटतं नाही.

संतांचे आपल्यावर उपकार आहेत की त्यांनी ही स्थिती अनुभवली आणि स्वतःचे अवतरण करून ती अभंगाच्या रूपात आपल्या समोर ठेवली, अन्यथा त्याची शाब्दिक अनुभूति आपल्याला घेणं शक्य झालं नसतं…!

जय जय रघुवीर समर्थ 

– – – 

नारद भक्ति सूत्रे ५६ 

गौणी त्रिधा गुण भेदादार्तादिभेदाद्वा||५६||”

अर्थसत्त्व, रज आणि तम या तीन प्रकारांच्या भेदांमुळे किंवा आर्त, जिज्ञासू आणि अर्थार्थी या तीन प्रकारच्या भेदांमुळे गौण भक्तीचे तीन प्रकार होतात, करता येतात.

विवेचन: भक्तीचे प्रामुख्याने दोन भाग केलेले आढळतात. एक मुख्य भक्ति आणि दुसरी गौणी भक्ति. सर्वसाधारण मनुष्य बरेच वेळेस अपघाताने या भक्तिमार्गात खेचला जातो, असे म्हटले तर वावगे होऊ नये. कधी हा अपघात सुखद असतोझ तर बरेच वेळेस तो वेदनेचा असतो, असे आपल्या लक्षात येईल. जन्माला आला आणि भक्तिमार्गाला लागला असा जीव सापडणे म्हणजे वाळवंटात पाणी सापडण्यास सारखे म्हणता येईल..!

प्रत्येक मनुष्यच नव्हे तर सारी सृष्टि त्रिगुणाची बनलेली आहे असे आपल्या लक्षात येईल. सत्व, रज आणि तम. प्रत्येक मनुष्यात या तिन्ही गुणांचे प्रमाण कमीअधिक प्रमाणात असते. ज्याप्रमाणे ते त्या त्या मनुष्याचा अंगी हे तीन गुण असतात, त्यानुसार तो करीत असलेली भक्ति सात्विक, राजस किंवा तामस स्वरूपात प्रकट होत असते. भक्ति न करणाऱ्यापेक्षा तामस भक्ति करणारा बरा. तामस भक्ति करता करता कालांतराने बदल होऊन मनुष्य राजस भक्ति करू लागतो आणि अशी राजस भक्ति वृद्धिंगत होत गेली हा मनुष्य सात्विक भक्ति करू लागतो. या तिन्ही भक्ती चढत्याक्रमाने उत्तम मानल्या जातात.

समर्थ रामदास स्वामी या त्रिगुणांचे वर्णन पुढील प्रमाणे करतात – –

“मुळीं देह त्रिगुणाचा । सत्त्वरजतमाचा ।

त्यामध्यें सत्त्वाचा । उत्तम गुण ॥ १ ॥

सत्वगुणें भगवद्भवक्ती । रजोगुणें पुनरावृत्ती ।

तमोगुणें अधोगती । पावति प्राणी ॥ २ ॥”

(दासबोध दशक २, समास ५)

आता मुख्य भक्ति कशी असते हे सुद्धा आपण अभ्यासले पाहिजे. एकूण चार प्रकारचे भक्त सांगितले जातात. याचे वर्णन गीताई मध्ये पुढील प्रमाणे आले आहे – – 

“भक्त चौघे सदाचारी भजती मज अर्जुना|

ज्ञानी तसे चि जिज्ञासू हितार्थी आणि विहृ़ल||”

(गीताई ०७:१६)

– – – सात्विक भक्ति फळास येते तेव्हा तो भक्त सिद्ध स्थितीस पोहोचतो.

मी आहे, हे भक्तिमार्गातील पहिली पायरी. मी आहे आणि देव आहे ही दुसरी पायरी म्हणता येईल आणि देहबुद्धीचा लय होऊन देव आहे आणि मी नाही अशी स्थिती येणे ही भक्तिमार्गातील सर्वोच्च पायरी म्हणता येईल. थोडक्यात काम्य भक्तीतून निष्काम भक्तीकडे वाटचाल होणे म्हणजे भक्तिमार्गात प्रगती होणे असे म्हणता येईल.

जय जय रघुवीर समर्थ 

नारद महाराज की जय!!!

– भक्ती सूत्र क्र. ५४ / ५५ / ५६ 

© श्री संदीप रामचंद्र सुंकले (दास चैतन्य)

थळ, अलिबाग. 

८३८००१९६७६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “ऑपरेशन ‘लोकटक विजय’” – भाग – १ ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

☆ “ऑपरेशन ‘लोकटक विजय’” – भाग – १ ☆ श्री संभाजी बबन गायके

ब्रिगेडीअर श्री. सौरभ सिंग शेखावत (Retd.)

मणिपुरच्या मैतेई बांधवांच्या भाषेत ‘लोक’ म्हणजे वाहता प्रवाह आणि ‘टक’ म्हणजे शेवट… टोक! ‘लोकटक’ म्हणजे वाहत्या प्रवाहाचे अंतिम टोक!

हे लोकटक म्हणजे एक विशालकाय गोड्या पाण्याचे सरोवर आहे.. क्षेत्रफळ सुमारे २५० चौरस किलोमीटर्स जे पावसाळ्यात ५०० चौरस किलोमीटर्सपर्यंत विस्तारत जाऊ शकते! आणि या सरोवरात एक जागतिक आश्चर्य नांदताना दिसते… या सरोवरात सुमारे सहा हजार माणसं राहतात!

या सरोवरात एक विशिष्ट प्रकारचे गवत उगवते आणि कालांतराने हे गवत तळापासून वेगळे होऊन पाण्यावर तरंगू लागते. तळातून सोबत आलेली माती, पाण्यातील रासायनिक घटक आणि इतर नैसर्गिक प्रक्रिया घडत जाऊन हे गवत पुंजक्या पुंजक्यांनी एकमेकाला जोडले जाते आणि दोन-तीन मीटर्स जाडी असलेले जणू एक तरंगणारे बेटच अस्तित्वात येते… असे बेट जे माणसांचे, घरांचे वजन पेलू शकेल! या पुंजक्याला ‘फुमदी’ म्हणतात. मासेमार बांधव असा फुमदी एकत्रित करतात आणि त्या जोडून एक मोठे वर्तुळ तयार करतात… त्या वर्तुळातल्या पाण्यात जाळी टाकतात व मासे पकडतात. याच वर्तुळात माशांची पैदासही केली जाते.

बांबू, प्लास्टिक आणि अन्य हलक्या वस्तू वापरून या तरंगत्या बेटांवर इथल्या मच्छीमार बांधवांनी राहण्याजोगती घरं निर्माण केलीत. सरोवरातील मासळी पकडून शहरांत जाऊन विकणे हा इथला प्रमुख व्यवसाय! वर्षाला साधारण दीड हजार टन मासळी इथून मिळते. एरव्ही ही बेटं त्या भव्य सरोवरात एकाकीच… चहूबाजूंनी पाणी आणि जमिनीवर पाय ठेवण्याचं एकमेव साधन म्हणजे निमुळत्या हलक्या, लाकडी नावा.. canoes!

मणिपूरची राजधानी इंफाळ इथून ३८ किलोमीटर्सवर आहे. शेजारचा ब्रम्हदेश मात्र इथून हाकेच्या अंतरावर… एवढा जवळ की काही तासांत तिकडे जाऊन इकडे सहीसलामत परत येता यावे!

उत्तर-पूर्व भारताचे मणिपूर… महाराजा बोधाचंद्र सिंग यांनी घेतलेल्या निर्णयानुसार १५ ऑक्टोबर, १९४९ रोजी भारतात विलीन झाले आणि १९७२ मध्ये मणिपूरला पूर्ण राज्याचा दर्जा दिला गेला. परंतू साधारणत: १९६४ पासून या प्रदेशातील काही विशिष्ट समाजसमूहातील काही गट भारतापासून वेगळे होण्याच्या दृष्टीने शेजारील काही देशांच्या मदतीने भारतविरोधात सशस्त्र संघर्ष करण्याच्या प्रयत्नात आहेत. विविध नावांनी कार्यरत असलेल्या या संघटनांत हजारो सशस्त्र, प्रशिक्षित अतिरेकी होते आणि आहेत! अपहरण, हत्या आणि खंडणी गोळा करणे हा यांचा प्रमुख उद्योग आहे. भारतात कारवाया करून म्यानमार (तत्कालीन ब्रम्हदेश)मध्ये पलायन करायचे अशी यांचा कामाची पद्धत आहे.

भारताचे सार्वभौमत्व अखंडित राखण्यासाठी भारतीय सैन्यदल इथे सातत्याने डोळ्यांत तेल घालून कार्यरत असते… सीमा सुरक्षा बल, आसाम रायफल्स, आसाम पोलिस इत्यादी आणि भारतीय सैन्यातील शेकडो जवान-अधिकारी यांनी यासाठी प्राणांची आहुतीही दिलेली आहे! शिवाय घनदाट जंगल, दमट हवामान, पर्वतराजी अशी बिकट स्थिती आहेच.

२००८… याच तरंगत्या ‘फुमदी’ पैकी एका फुमदी वर काही झोपड्या होत्या. त्यांपैकी मध्यभागी असलेल्या चार झोपड्यांत दहा-बारा अतिरेकी वस्ती करून असल्याची पक्की खबर भारतीय सेनेला प्राप्त झाली! एका स्थानिक व्यक्तीला त्या अतिरेक्यांनी धमकावून पैसे मागितले होते अन्यथा त्याची हत्या केली जाईल, असा दमही दिला होता. त्या व्यक्तीच्या भावाकडून ही माहिती स्थानिक पोलिसांना आणि तिथून आपल्या सैन्याला मिळाली होती… खात्री करून घेणे गरजेचे होते… पण एवढ्या मोठ्या संख्येने अतिरेकी सापडणार असतील तर धोका पत्करणे अपरिहार्य होते!

परंतू वरिष्ठ अधिकारी अशा कोणत्याही मोहिमेला परवानगी देत नव्हते. कारण या मोहिमेत प्रचंड धोका होता. मणिपूरची त्यावेळची राजकीय, सामाजिक परिस्थिती लक्षात घेता, जर मोहीम फसली तर स्थानिक जनतेचा मोठा रोष पत्करावा लागण्याची शक्यता होती… किंबहुना देशविघातक शक्ती असे काही होण्याची ववाटच पहात असतात. नकार ऐकून या मोहिमेवर जाऊ इच्छिणारे आपले कथानायक अधिकारी मनातून खट्टू झाले… पण शेवटी आज्ञा ती आज्ञाच.

परंतू दुर्दैवी योगायोगाने आपल्या बी. एस. एफ. च्या तळावर काहीच दिवसांत मोठा अतिरेकी हल्ला झाला आणि अनेक जवानांची आहुती पडली. यामुळे चिडलेल्या अधिका-यांनी या अतिरेक्यांविरोधात मोठी मोहीम उघडण्याची व त्यांना धडा शिकवण्याची आवश्यकता व्यक्त केली. अर्थातच या लोकटक मोहिमेस हिरवा कंदील मिळाला… आणि सैनिक, अधिकारी तयारीला लागले!

अतिरेक्यांचा ठावठिकाणा समजावा म्हणून खब-याला घेऊन सैन्य पथकाच्या प्रमुखांनी काही सैनिकांना सोबत घेऊन एका बोटीतून तिकडे प्रयाण केले. काही अंतरावर असताना त्यांना लाकूड तोडण्याचा आवाज आला. खबरी म्हणाला, “हे लोक म्यानमारमधून इकडे घुसतात, बांबू, लाकडे तोडून घेऊन जातात. ते लोक तिथून जाईपर्यंत साहेबांनी दबा धरून वाट पाहिली. कोणतीही सैन्य कारवाई करण्यापूर्वी अगदी सूक्ष्म नियोजन करणे आवश्यक असते! आरंभी असे ऑपरेशन अतिशय धोकादायक, अव्यवहार्य आहे, असं सांगून प्रमुख अधिका-यांनी या मोहिमेस परवानगी नाकारली होती. इथे काही हजार सामान्य नागरिकही रहात असल्याने हवाई हल्ला हा पर्याय असूच शकत नव्हता. त्यांना सर्व बाजूंनी घेरायचे म्हटले तर तिथपर्यंत पोहोचायला नावांशिवाय पर्याय नव्हता. यांत्रिक नावा, रबर बोटी वापरणे सोयीचे नव्हते… कारण सरोवरातील ‘फुमदी’ तरंगत असतात आणि सतत जागा बदलतात.. त्यांच्या गवतात नाव अडकून बसतात. दिवसा-उजेडी अतिरेक्यांच्या वस्तीपर्यंत पोहोचायचे म्हणजे अतिरेक्यांना येणा-या बोटी सहज दिसणार… आणि त्यांच्याकडे असलेल्या अत्याधुनिक शस्त्रांनी ते पाण्यातून येणा-या सैन्यावर सहज आणि अचूक गोळीबार करू शकणार! अशी परिस्थिती होती. त्यांनी गोळीबार आरंभला तर प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात स्थानिक सामान्य लोकांच्या जीवाला धोका होता!

इथून सुरु झालं.. ४५ दिवसांचं एक अद्भूत ऑपरेशन… एक सैन्य मोहिम… जिचं नाव ठेवलं गेलं.. ऑप. लोकटक विजय! जमिनीपासून अतिरेकी वस्ती सुमारे सात किलोमीटर्सवर असावी. विविध प्रकारची त्यावेळची आधुनिक संपर्क साधने, दुर्बिणी वापरून या वस्तीवर बारीक नजर ठेवली जाऊ लागली. एका उंच झाडावर चढून एका सैनिकाला ते ठिकाण नेमके कुठे आणि कसे आहे, यावर नजर ठेवण्याची जबाबदारी दिली गेली. त्या सैनिकाने तेवढ्या उंचीवर चढून मचाण बांधले आणि आधुनिक उपकरणे वापरून बरीच माहिती गोळा करून दिली! अचूक हल्ला करण्यासाठी अतिरेक्यांच्या वस्तीचे निश्चित ठिकाण समजणे गरजेचे होते. त्यासाठी ज्याने खबर आणली होती, त्यालाच मासेमार म्हणून तिथपर्यंत जाऊन यायला सांगितले… त्याच्याकडे आधुनिक यंत्रणा लपवून दिली… त्यामुळे तांत्रिक भाषेत co-ordinates मिळू शकले!

नावा घेऊन जाणे अशक्य असल्याने तिथपर्यंत पोहत जाण्याचा मार्ग निवडला गेला… पण अंतर होते सात किलोमीटर्स. अवजड शस्त्रं घेऊन पोहत जाणे… कल्पना करता येईल का? यासाठी सराव पाहिजे. दिवसा सराव करता येणार नव्हता. कारण सरोवरात दिवसभर म्हणजे पहाटे चार ते रात्री दहा-साडेदहापर्यंत मासेमारी चालते… लोक सैनिकांना सराव करताना दिसता कामा नव्हते! यावर उपाय म्हणून या सरोवराच्या एका बाजूला असलेल्या चार-साडेचार किलोमीटर्स लांबीच्या एका कालव्याचा वापर करण्याचे ठरले. त्यानुसार रात्री अकरा ते पहाटे साडेतीन पर्यंत सैनिक शस्त्रं घेऊन त्या थंडीत पोहण्याचा सराव करू लागले. एवढे काटक, कणखर सैनिक परंतू इतका वेळ पोहणे म्हणजे मानवी क्षमतेची कसोटी पाहणारे ठरत होते. कित्येक सैनिक आजारी पडले आणि त्यांना अतिदक्षता विभागात ठेवावे लागले. कित्येकांचे पाच-सहा किलो वजन कमी झाले. कालव्याच्या पाण्याचा त्यांच्या शरीरावर परिणाम दिसू लागला. पण तरीही सराव सुरु होताच! पण पुढे असे लक्षात आले की, एवढे पोहूनही रात्रीच्या अंधारात आणि मर्यादित वेळेत लक्ष्य गाठता येणार तर नाहीच, पण गाठले गेले तरी प्रचंड थकलेले सैनिक लढणार तरी कुठल्या बळाने!

काही दिवसांनी ही योजना मागे ठेवण्यात आली. आणि रबरी नावा आणल्या गेल्या, पण सरोवरातील गवतामुळे त्याही प्रभावीरीत्या चालेनात… अडकून राहू लागल्या. निमुळत्या नावा अर्थात canoes मधून जायचे ठरले. पण ह्या नावा स्थानिक पातळीवरून खरेदी केल्या असत्या तर त्याचा बोभाटा झाला असता म्हणून दुस-या राज्यातून त्या मागवून घेतल्या गेल्या! पण canoe चालवण्यासाठीही सराव पाहिजे. कारण canoe म्हणजे जणू सायकल. सराव नसला म्हणजे सायकल चालवताना जसा माणूस कोसळतो, तसे पाण्यात कोसळावे लागणार!

मग पुढील काही दिवस canoe चालवून सराव केला गेला… यात हलत्या नावांत उभे राहून गोळीबार करण्याच्या सरावाचाही समावेश होताच. गरज पडेल तेंव्हा या canoe पाण्यात पालथ्या करून त्या पालथ्या झालेल्या canoeवर बंदुका टेकवून, पाण्यात तरंगत राहातही निशाणेबाजीचा सराव झाला! या प्रयत्नांत हत्यारे पाण्यात पडत, बुडून तळाशी जात. मग आपले पाणबुडे सैनिक ही हत्यारे शोधून परत आणीत. असे वीस पंचवीस दिवस झाल्यावर एकेदिवशी ‘टार्गेट’ (लक्ष्य)च्या किती जवळ जाता येईल याची चाचणी झाली… यशस्वी चाचणी झाली!

– क्रमशः भाग पहिला 

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “देवाचं काही अडत नाही..” कवी :कुसुमाग्रज ☆ प्रस्तुति – उज्ज्वला केळकर ☆

उज्ज्वला केळकर

? वाचताना वेचलेले ? 

☆ “देवाचं काही अडत नाही..” कवी :कुसुमाग्रज ☆ प्रस्तुति – उज्ज्वला केळकर

देव मानावा की मानू नये

या भानगडीत मी पडत नाही,

आपल्या मान्यतेवाचून

देवाचं काही अडत नाही..!

 

ज्यांना देव हवा आहे

त्यांच्यासाठी तो श्वास आहे,

ज्यांना देव नको आहे

त्यांच्यासाठी तो भास आहे,

आस्तिक नास्तिक वादात

मी कधीच पडत नाही,

आपल्या मान्यतेवाचून

देवाचं काही अडत नाही..!

 

हार घेऊन रांगेत कधी

मी उभा रहात नाही,

पाव किलो पेढ्याची लाच

मी देवाला कधी देत नाही,

जो देतो भरभरून जगाला

त्याला मी कधी देत नाही,

आपल्या मान्यतेवाचून

देवाचं काही अडत नाही..!

 

जे होणारच आहे

ते कधी टळत नाही,

खाटल्यावर बसून

कोणताच हरी पावत नाही,

म्हणून मी कधी

देवास वेठीस धरीत नाही,

आपल्या मान्यतेवाचून

देवाचं काही अडत नाही..!

 

देव देवळात कधीच नसतो…

तो शेतात राबत असतो,

तो सीमेवर लढत असतो,

तो कधी आनंदवनात असतो,

कधी हेमलकसात असतो,

देव शाळेत शिकवत असतो,

 तो अंगणवाडीत बागडत असतो,

तो इस्पितळात शुश्रूषा करीत असतो,

म्हणून…

ह्यांच्यातला देव मी कधी नाकारत नाही,

 

आपल्या मान्यतेवाचून

देवाचं काही अडत नाही..!

* * * *

कवी: कुसुमाग्रज

प्रस्तुती: उज्ज्वला केळकर

संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३  सेक्टर – ५, सी. बी. डी. –  नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र

मो.  836 925 2454, email-id – kelkar1234@gmail.com 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ आलेख # २८२ ☆ नवदुर्गा का आगमन: नारी सृजनधर्मिता का उत्सव… ☆ श्रीमती छाया सक्सेना ‘प्रभु’ ☆

श्रीमती छाया सक्सेना ‘प्रभु’

(ई-अभिव्यक्ति में संस्कारधानी की सुप्रसिद्ध साहित्यकार श्रीमती छाया सक्सेना ‘प्रभु’ जी द्वारा “व्यंग्य से सीखें और सिखाएं” शीर्षक से साप्ताहिक स्तम्भ प्रारम्भ करने के लिए हार्दिक आभार। आप अविचल प्रभा मासिक ई पत्रिका की  प्रधान सम्पादक हैं। कई साहित्यिक संस्थाओं के महत्वपूर्ण पदों पर सुशोभित हैं तथा कई पुरस्कारों/अलंकरणों से पुरस्कृत/अलंकृत हैं। आपके साप्ताहिक स्तम्भ – व्यंग्य से सीखें और सिखाएं  में आज प्रस्तुत है एक विचारणीय रचना “नवदुर्गा का आगमन: नारी सृजनधर्मिता का उत्सव। इस सार्थक रचना के लिए श्रीमती छाया सक्सेना जी की लेखनी को सादर नमन। आप प्रत्येक गुरुवार को श्रीमती छाया सक्सेना जी की रचना को आत्मसात कर सकेंगे।)

☆ साप्ताहिक स्तम्भ  – कविता # २८२ ☆ नवदुर्गा का आगमन: नारी सृजनधर्मिता का उत्सव…

शारदीय आकाश की कोमल आभा के साथ ही मन में एक दिव्य अनुभूति जाग उठती है—माँ के आगमन की। नवरात्रि केवल पर्व नहीं, बल्कि शक्ति, श्रद्धा और सृजन का उत्सव है, जहाँ सम्पूर्ण सृष्टि अपनी जननी के स्वागत में नत होती है।

इस पावन आरंभ में जवारे बोने की परंपरा विशेष महत्व रखती है। मिट्टी में डाले गए ये बीज केवल अन्न नहीं, बल्कि आशा, उर्वरता और नवजीवन के प्रतीक होते हैं—मानो माँ के आशीष से जीवन हरा-भरा हो उठे।

“पूजन करते भक्त, जवारे बो कर मैया,

खुशहाली चहुँओर, मिले हम सब को छैया।”

इन पंक्तियों में जनमानस की वही प्रार्थना है, जो हर हृदय में धड़कती है।

भारतीय संस्कृति में नारी को सदा “शक्ति” माना गया है। नवदुर्गा के नौ स्वरूप हमें याद दिलाते हैं कि नारी केवल सृजन ही नहीं, बल्कि संरक्षण और परिवर्तन की आधारशिला भी है। आज की नारी हर क्षेत्र में अपने सामर्थ्य का परिचय देते हुए अपने भीतर की दुर्गा को जागृत कर रही है।

जब एक स्त्री घर, समाज और अपने स्वप्नों को संवारती है, तब वह केवल जीवन नहीं जीती—वह सृजन करती है। यही उसकी सच्ची “सृजनधर्मिता” है, जिसे नवरात्रि का यह पर्व और अधिक उजागर करता है।

“हरीभरी हो गोद, यही माँगे जन सारे,

शेर सवारी दिव्य, मातु वर दायक धारे।”

इन भावों में माँ के प्रति विश्वास, सुरक्षा और समृद्धि की कामना सहज ही झलकती है।

नवरात्रि हमें यह भी सिखाती है कि शक्ति की पूजा केवल अनुष्ठानों में नहीं, बल्कि हर नारी के सम्मान में होनी चाहिए। यही सच्ची आराधना है।

माँ दुर्गा का यह पावन पर्व हम सभी के जीवन में सुख, शांति और नवसृजन का प्रकाश भर दे—

जय माता दी।

**

©  श्रीमती छाया सक्सेना ‘प्रभु’

माँ नर्मदे नगर, म.न. -12, फेज- 1, बिलहरी, जबलपुर ( म. प्र.) 482020

मो. 7024285788, chhayasaxena2508@gmail.com

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ ≈

Please share your Post !

Shares