मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “बारा अमावस्यांचा हा गराडा सुटेल का कधी?” –  भाग – 1 ☆ श्री मयुरेश उमाकांत डंके ☆

श्री मयुरेश उमाकांत डंके

? इंद्रधनुष्य ?

☆ “बारा अमावस्यांचा हा गराडा सुटेल का कधी?” –  भाग – 1 ☆ श्री मयुरेश उमाकांत डंके

गेल्या २० वर्षांमध्ये प्रतापगडावर मी आजवर अक्षरशः शेकडो वेळा गेलो आहे. पौर्णिमेच्या रात्री गेलो आहे, दीपोत्सव करायला गेलो आहे,भर पावसात भिजत कुडकुडत गेलो आहे, गारठ्याच्या थपडा खात गेलो आहे, जावळीतून जंगलाच्या वाटेनं गेलो आहे, कुंभरोशी पासून गेलो आहे, निसणीच्या वाटेनं गेलो आहे, किनेश्वर पासून गेलो आहे, रडतोंडी मधून गेलो आहे. आंबेनळी, रडतोंडी, पारघाट हे सगळं अनेकदा पायी पालथं घालून झालं आहे. हे सगळं कशासाठी? फक्त एकच गोष्ट – शिवाजी महाराजांच्या अफाट बुध्दीवैभवाविषयीचं विलक्षण प्रेम..!

शिवाजी महाराजांच्या वयोमानानुसार त्यांच्या चरित्रातल्या घटनांचा आढावा घेतला तर मीच काय, प्रत्येकजण मुग्ध होईल. मानसशास्त्रातल्या शारीरिक वय आणि मानसिक वय या दोन्ही संकल्पना शिवचरित्रातल्या प्रसंगांना लावून पाहत गेलो की, प्रत्येक ठिकाणी असं वाटायला लागतं की, ज्या वयात महाराजांनी ज्या अवघड प्रसंगांना तोंड दिलं आणि विजय मिळवला, त्या वयात सर्वसामान्य व्यक्ती काय करतात? ज्या वयात मुलांना चेक अन् डिमांड ड्राफ्ट मधला फरकसुध्दा समजत नाही, ज्या वयात मुलांना वागण्या-बोलण्याचा पाचपोच येत नाही, त्या वयात शिवाजीराजे आपल्या असामान्य बुध्दीचातुर्याच्या बळावर चार-चार पातशाह्यांना साम-दाम-दंड-भेदावर अक्षरशः नाचवत होते. अख्खे च्या अख्खे नवे दुर्ग निर्माण करत होते. नवनवी हुशार, शूर, प्रसंगावधानी माणसं निवडून त्यांना आपलीशी करत होते. न्यायनिवाडे करत होते. गुन्हेगारांचे चौरंग करत होते. स्वतःच्या कर्तृत्वाच्या बळावर जनमानसामध्ये स्वतः विषयी दृढ विश्वास उत्पन्न करत होते. दुष्टांना तातडीने शासन आणि सज्जनांचं, गुणवंतांचं प्रतिपालन करत होते. स्वराज्य म्हणजे नेमकं काय आणि त्याचे पैलू कोणकोणते असावेत हे ठरवत होते. हे सगळं उभं करताना केवळ तलवार नव्हें तर लेखणीही वापरत होते.

स्वराज्यनीती आखत असताना जे संकल्पचित्र त्यांनी स्वतःसमोर ठेवलं होतं, त्याची सुस्पष्टता एका रात्रीत आलेली नाही. कित्येक तास, कित्येक प्रहर, कित्येक रात्री त्यांनी स्वराज्यचिंतनात घालवलेल्या असतील. केवढा सकारात्मक स्वसंवाद साधला असेल, त्याची गणती नाही, नोंद नाही. तो महाराजांचा मनोव्यापार कुठंही नोंदवलेला दिसत नाही. तीनशे वर्षं गुलामगिरीत अन् अत्याचारात पिचत पडलेल्या महाराष्ट्राला स्वतंत्रतेची संजीवनी देणाऱ्या महाराजांची मानसिक तपश्चर्या आजवर कुणी मांडली आहे?

मी प्रतापगडावर गेलो की, सईबाईसाहेबांच्या निधनानं दुःखी झालेल्या आणि इच्छा असूनही त्यांचं अंत्यदर्शन घेऊ न शकणाऱ्या राजांनी गडावर कुठं उभं राहून स्वतःच स्वतःचं सांत्वन केलं असेल, हे शोधत फिरतो. आपल्या पत्नीच्या अकाली निधनाचा शोक व्यक्त करायला सुध्दा वेळ मिळू नये, अशा दैवगतीच्या विचित्र फेऱ्यातून राजे कसे बाहेर पडले असतील? तो त्यांचा स्वसंवाद कुठं मिळतो का, हे पाहत फिरतो. अगदी लहान वयात आईचं छत्र गमावलेल्या शंभूराजांच्या विषयी त्यांच्या काळजात किती गलबला सुरु असेल, त्याचे अंश कुठं दिसतात का, हे शोधतो. खानाला मारुन वाऱ्याच्या वेगानं गडाच्या दरवाजातून येणाऱ्या राजांच्या अंगाचे घामाचे थेंब तिथं पडले आहेत. कपाळीच्या वारातून झालेल्या जखमेतून एखादा रक्ताचा थेंब तिथं सांडला असेल.. मी तो लाखमोलाचा थेंब शोधण्याचा आटोकाट प्रयत्न करतो.

पण पिठलं भाकरी, भरलं वांगं, मटकी उसळ, पुरणपोळी, मिसळपाव, वडापाव, कांदा भजी, ताक, लस्सी, सोलकढी, लिंबू सरबत, कोकम सरबत, टीशर्ट, टोप्या, गॉगल्स यांच्या दुकानांच्या गर्दीत मला ह्यातलं काहीच गवसत नाही. गेल्या पंधरा वर्षांत मला तिथलं इतिहासाचं अस्तित्वच पुसट होत चाललंय असं जाणवतं.

राजांच्या मनातला कुणालाही शब्दांत कधीच न मांडता आलेला एक अतिशय हळवा कोपरा याच गडावर आहे., हो.. अजूनही इथंच आहे.. त्यांचं मंत्रमुग्ध करणारं शौर्य जगापुढं आहे, पण त्यांचं पत्नीवियोगाचं मूक रुदन, त्यांचे अदृश्य अश्रू – जे इतिहासाच्या पानांनी स्वतःवर लिहून घेतलेले नाहीत, तेही इथंच आहेत..!

एका बाजूला पराकोटीचं दुःख अन् दुसऱ्या बाजूला स्वराज्यावरच्या संकटाला तोंड देण्यासाठी स्वतःमध्ये उभं केलेलं धैर्य… हे द्वंद्व उकलून सांगणारा, राजांची व्यथा उलगडून दाखवणारा एकही गाईड मला प्रतापगडावर आजतागायत दिसला नाही. पंताजी गोपीनाथ बोकीलांची वकिली सांगणारा गाईड मला आजपर्यंत प्रतापगडावर सापडला नाही. कान्होजी जेध्यांचं भक्कम इमान इथले गाईड सांगत नाहीत. बहिर्जी नाईक आणि त्यांच्या हेरखात्यातल्या माणसांची कामगिरी इथले गाईड सांगत नाहीत.

साक्षात् आई जगदंबेेनं दृष्टांत देऊन महाराजांना आशीर्वाद दिलेलं हे स्थान आहे. त्याचा साधा उल्लेखसुध्दा हे गाईड करत नाहीत. शिवप्रताप दिनाच्या आदल्या रात्रीची राजांची थोरली मसलत नेमकी कुठं झाली असेल, हे एकाही गाईडला दाखवावंसं वाटत नाही. अफजलखानाची कपटी आणि क्रूर वृत्ती हे गाईड सांगत नाहीत. साठ कबरा हे काय प्रकरण आहे, हे सांगत नाहीत. भेटीच्या वेळी पहिला दगा खानानं केला हेही प्रतापगडाचे गाईड अजिबात सांगत नाहीत. (पण जंजिऱ्यावरचे गाईड मात्र सिद्धीचं कौतुक गाताना घसा पार कोरडा झाला तरी थकत नाहीत. बोटीच्या अर्ध्या तासाच्या प्रवासात जंजिऱ्याचा नावाडी सिद्दी हा कसा लोककल्याणकारी होता आणि त्यानं प्रजेसाठी काय काय चांगलं केलं हे तो मनावर ठसवतोच. पद्धतशीर ब्रेनवॉशची पद्धत..!

जंजिऱ्यावर डोळ्यांवर गॉगल चढवून, सोबतच्या व्यक्तीचा हात हातात घेऊन, कुशीत घेऊन, मिठीत घेऊन फोटो काढण्यासाठी आलेली माणसं इतिहासाची पुस्तकं वाचून आलेली नसतात. ती ह्या गुणगानाला बळी पडतातच..!

जनीच्या टेंभावर सध्या जाता येत नाही. पण नेमकी लढाई झाली कशी अन् खानाच्या छावणीचा खुर्दा राजांनी उडवला कसा, हे समजावून सांगण्यासाठी प्रतापगडाचा एक गुंडाळी नकाशा सोबत ठेवून गाईड ही लढाई सांगू शकत नाही का? वाघनखाचं एक मॉडेल सोबत ठेवून ते दाखवू शकत नाही का? आपल्या सोबत एखादं चिलखताचं चित्र सोबत ठेवू शकत नाही का? “राजं, माझं एवढं मागणं ऐका. अंगाला सील करा.” असं राजांना अत्यंत काळजीनं सांगणारे कृष्णाजी बंककर लोकांना सांगावेत, हे त्या गाईडच्या कल्पनेतही नसतं. कुठल्याही मोहिमेवर असोत किंवा कितीही कामात असोत, पण राजांची रोजची देवपूजा आणि व्यायाम कधीही चुकला नाही, हे गाईडनं का सांगू नये?

एकाही गाईड जवळ दुर्बीण नाही. जावळीचा प्रदेश आणि प्रतापगडाच्या चारही बाजूंनी असणारे वेगवेगळे दुर्ग अन् घाटवाटा दुर्बिणीशिवाय कशा दाखवता येतील? सह्याद्री मधला एखादा दुर्ग लोकांना दाखवणाऱ्या गाईडकडं एखादी चांगली दुर्बीण असणं ही वन टाईम इंव्हेस्टमेंट असते. पण तेही नाही.

१९३२२४ हा पिनकोड तुम्हाला माहिती आहे का? जम्मू काश्मीर मधल्या कुपवाडा जिल्ह्यात किशनगंगा नदीच्या काठी भारतातलं प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरचं पोस्ट ऑफिस आहे. तिथं जाणारे अनेक पर्यटक त्या पोस्ट ऑफिस मधून स्वतःच्या घरच्या पत्त्यावर पोस्टकार्ड पोस्ट करतात. म्हणजे, भारतातल्या या सीमेवरच्या पोस्ट ऑफिसचा शिक्का असलेलं पत्र त्यांना घरपोच मिळतं आणि ती एक अविस्मरणीय आठवण त्यांच्या संग्रही राहते.

असंच एक पोस्ट ऑफिस प्रतापगडावर आहे. ४१२८०६ हा प्रतापगड किल्ल्याचा पिनकोड आहे. इथून पाठवलेल्या पोस्टकार्ड वर प्रतापगडाचं चित्र असलेला एक विशेष शिक्का मिळतो. पण गाईड हे सांगतच नाहीत. फक्त ५० पैसै किंमतीचं एक पोस्टकार्ड गाईडनं दिलं आणि दोन मिनिटांत त्यावर “छत्रपती शिवाजी महाराज की जय” असं लिहायला लावून ते पोस्ट करायला लावलं तर प्रतापगडावर येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीकडे एक उत्तम आठवण संग्रही राहील. एखाद्या उत्तम स्केच आर्टिस्ट कडून केवळ पोस्ट कार्ड्स वर शिवाजी महाराजांची छोटीशी स्केचेस, राजमुद्रा, कॅलिग्राफी मधली घोषणा किंवा आज्ञापत्रातलं एखादं वाक्य असं काही करुन घेऊन ती कार्ड्स स्वतःच्या पत्त्यावर पोस्ट केली तर कुठल्याही सेल्फी किंवा मोबाईलवर काढलेल्या फोटोपरीस त्या पोस्टकार्डचं महत्त्व सोन्याहून मोठं असेल…! पण प्रतापगड दुर्ग पर्यटनाकडे ती दृष्टीच नाही…!

– क्रमशः भाग पहिला

©️ श्री मयुरेश उमाकांत डंके

मानसतज्ज्ञ, संचालक-प्रमुख, आस्था काऊन्सेलिंग सेंटर, पुणे.

 8905199711, 87697 33771

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “कामयाब होनेके लिये…” ☆ सुश्री संध्या बेडेकर ☆

सुश्री संध्या बेडेकर

? इंद्रधनुष्य ?

☆ “कामयाब होनेके लिये…” ☆ सुश्री संध्या बेडेकर ☆

मान्या सिंग

“कामयाब होने के लिए ‘Comfort Zone’ छोड़ना पड़ता हैं।”••••

काल  VLCC  Femina Miss India  runners up (2020) चा ‘Interview ‘बघत होते.•••••

….  मान्या  सिंग  तिचे नाव. या आधी तिची  ओळख म्हणजे एका अॉटो रिक्षा चालकाची मुलगी, अशी  होती.खास ओळख नव्हतीच. आपल्या सारख्या सामान्य ”status’च्या लोकांना काही जणच  ओळखतात. त्यांच्या आजूबाजूला राहणारे किंवा त्यांचे नातेवाईक. बाहेरच्या जगात त्यांना मान  मिळतोच अस नाही.परंतु टिंगल उडविणारे लोक खूप असतात. आपल्या चौकटीतून बाहेर निघायची जणू काही त्यांना परमीशनच नसते.थोडं काही वेगळ केले की लगेच बोलणाऱ्यांचे आक्रमण होते. कुठे   काही तरी मोठी   इच्छा बोलून दाखवायचाच  अवकाश , की लगेच  पाय ओढणारे  एकत्र होतात. बाहेरचे‌ व‌ घरचे  पण. बाहेरचे तर जणू काही आपला जन्मसिद्ध  हक्कच समजतात.••••

‘असं कसं शक्य आहे? एवढी मोठी झेप घ्यायची लायकी  /ऐपत   तरी  आहे का‌??” एखादाला  आपल्या दायऱ्यातून बाहेर निघायचा प्रयत्न करताना बघीतले की  आजूबाजूच्या  माणसांचा  ‘ego hurt’ होतो.•••

“आपली क्षमता समजावी.चादर बघून पाय पसरावे. स्वप्न बघावे पण काय??आणि किती झेपेल?? तेही बघून घ्यावे. वेड बीड लागलंय की काय?? “••••

म्हणजे आपला ‘ego’शांत करायला काही ही बोलायला ‌ सर्व तयारच असतात.

माझ्या जवळ सर्व असुनही, मी  तेथेच उभी आहे. आणि काही ही नसताना  ही कशी काय माझ्या पूढे जाण्याचा प्रयत्न करणार  आहे??

असा विचार करणारे शोधून तर बघा, एक नाही,शंभर मिळतील. कौतुक सपोर्ट  तर खूप दूरची गोष्ट आहे.सहारा, प्रोत्साहन देणे पण जमत नाही.. कौतुक खूप छोटा शब्द असला तरी कौतुक करायला मन खूप मोठं लागत.जे खूप कमी जणांजवळ असत.••••

स्वतः आपल्या चौकटीतून बाहेर निघायचे नाही.व कोणी प्रयत्न केला तर ते सहन होत नाही.••••

घरचे,  आपली  सांपत्तिक स्थिती, परिस्थिती बघून आपल्या मुलीला पूढे काय काय अडचणी येऊ शकतात.???ती ते सहन करू शकेल का? आपल्या गरीबीचा लोक मजाक उडवतील. श्रीमंत लोकांच्यात आपल्याला कोण विचारेल.??? या सर्व गोष्टींचा विचार करून  आपल्या अनुभवांवरून ,सावधगिरी बाळगावी.असे समजून,घरचे कसं जमेल तुला?? अशी काळजी  व  विचार करत असावेत.

मान्या कडे पण हेच झाले.तिची आई म्हणालीच •••••

“अपनी चद्दर देख के पैर फैलाने चाहिए । नहीं तो पैरोंको ठंड लगेगी   ।”•••

यावर मान्या ने दिलेले उत्तर,••••

“पैरों को ठंड लगेगी तो,चद्दर अपने आप बड़ी हो जाएगी । “••••

दिवसभर ‘audition’द्यायचे.तेथेच इतर मुलींना बघून शिकायचे.  रात्री कॉल सेंटर मधे काम करायचे. ते सर्व करत असताना आपले स्वप्न जिवंत ठेवायचे. ते  पूर्ण करायला धडपडायचे.••••

मान्याचे कौतुक असे की तिला तिच्यात काय आहे.??? हे माहीत होते.बहुतेक तेवढे पूरे होते,तिला आपले स्वप्न पूर्ण करायला. तिला स्वतः चा मार्ग शोधायचा होता.तिचे ध्येय तिला गाठायचे होते.  रस्ता कठीण होता. म्हणतात ना ••••

“रस्ता कठीण असला, रस्त्यावर काटे,दगड असले,तर   आपली पावले भरभर पडतात. काटेरी रस्त्यावर उन्हाचे ही खूप महत्व आहे.” ध्येयाकडे वाटचाल करणारे लोक आपल्या मेहनतीचा वेग एवढा वाढवतात की रस्त्यात येणाऱ्या अडचणी केंव्हा येतात???आणि जातात???? हे त्यांना  लक्षातही येत  नाही.••••

असेच होते  मान्याचे.••••

मान्याचे   कौतुक याकरिता की तिने   तिच्या रेंजच्या  बाहेर चे खूप  मोठे  स्वप्न बघायचे धाडस केले. ते स्वप्न बघण्यात येणाऱ्या अडचणींवर दुर्लक्ष केले. •••

माझ्या जवळ काय नाही??,त्यापेक्षा माझ्या जवळ काय आहे???. मी काय करू शकते ???यावर तिने लक्ष केंद्रित  केले.•••

तिचा  प्रवास सोपा नक्कीच नसेल.कारण जे क्षेत्र तिने निवडले होते तेथे वेगळ्याच प्रकारचे ट्रेनिंग लागते. एक ‘grace’  असावी लागते. येथे ‘Brain With Beauty ‘  ची परीक्षा असते.  ‘Stylish English ‘बोलणे  यावे लागते.उठणे,बसणे,चालणे सर्वच शिकावे लागते. थोडक्यात हे सर्व मोठ्या श्रीमंत  पैसे वाल्यां लोकांचे शौक असतात.असा सर्वसाधारण माणसांचा समज आहे. एक रूप सोडले तर बाकी सर्व तिला  शिकायचे होते. तेही पैसे नसताना.•••••

कितीदा  तरी तिचा अपमान झाला असेल. कितीदा तरी तुच्छतेने,उपहासाने तिच्या कडे बघीतले असेल. त्या  ‘so called high status fashionable ‘,फराटेदार इंग्लिश बोलणाऱ्या मुलींमध्ये तिचा जीव घाबरला असेल. असं खूप काही झालं असेल,जे सहन करायला धाडस लागत.  खरं तर अशा लोकांचे ध्येयापूढे, या गोष्टींकडे  लक्षच   जात  नाही.  ते आपली एनर्जी व  वेळ वाया घालवित  नाही. हे  सर्व ते   स्वतः च शिकतात. स्वकर्तृत्वाने प्रत्त्येक गोष्ट मिळवतात.•••••

मान्या  म्हणजे,••••

“एक बार मैंने  ठान ली, तो मैं अपने आप की भी नहीं सुनतीं ” अस  व्यक्तिमत्व  असावं। •••

साधारण  * समज, वय  व संकल्प * एकाच वेळेस हातात  हात घालून   एकत्र  फिरताना दिसत  नाही. पण मान्या नशीबवान आहे तिला  सर्व  गोष्टी एकाच वेळेस मिळाल्या व तिने त्याचे  सोने केले.••••

आज मान्या ने मिडिल क्लास मुलां समोर एक उदाहरण सेट केले.आदर्श ठेवला.प्रोत्साहन दिले.मोठी स्वप्न बघणे  फक्त  श्रीमंत लोकांचाच अधिकार आहे. हा गैरसमज दूर केला. मेहनत आत्मविश्वास च्या जोरावर कोणी ही  गरूडझेप घेऊ शकतो.••

आजकाल अशी बरीच उदाहरणे समाजात दिसतात. भाजी विक्रेत्याचा मुलगा IAS झाला. पोलिस हवालदार ची मुलगी IPS officer झाली. वडिलांच्या जागेवर  बस कंडक्टर ची नोकरी करणाऱ्या  आईचा मुलगा इंडियन क्रिकेट टीम मधे सिलेक्ट झाला.वगैरे वगैरे.••••

हा बदल कौतुकास्पद आहे.  प्रगतीची नवीन चाहूल लागली आहे. सर्व साधारण माणसाचा आत्मविश्वास जागृत झाला आहे. ही एक प्रकारची क्रांति आहे. लोकांमधे इच्छा शक्ती जागृत झाली आहे.आपल्या चौकटीतून बाहेर पडायला तो तयार झाला आहे. हा एक चांगला संकेत आहे.••••

सर्व सामान्य परिस्थितीतून बाहेर निघून प्रगती करणे कौतुकास्पद आहे.आपला दर्जा वाढविणे आपल्या हातात असतं. त्याकरिता खंबीर मन लागत. किती ही सर्व गुण संपन्न असले तरी आत्मविश्वास  हा सर्वात मोठा गुण आहे.मी काय आहे???आणि मी काय करू शकतो????यातील अंतर ज्याला  समजलं, गपॅ भरता आला.तो पूढे वाढतो.••••

मान्या म्हणजे ‘self made’ व्यक्तिमत्त्व. ज्या दिवशी तिला Miss India Runners  up चा Crown मिळाला.तो सोहळा तिच्या घरच्यांनी घरी TV नसल्याने मोबाईल वर बघीतला.••••

ही मुलं म्हणजे ••••

“Real Life  Real Hero’ आहेत. यांच्यात काय विशेष आहे?? •••

त्यांना कळलय ••••

” कामयाब होने के लिये अपना ‘Comfort Zone ‘छोडना पडता हैं । आपल्या घरट्यातून बाहेर निघणे गरजेचे आहे.”•••••

” I can do it ” हा आत्मविश्वास  वाढला आहे.•••

Well done!!!  मान्या ,धन्यवाद..

You have   set an example  for  others.•••

म्हणतात ना.•••

Success is not free,It comes at cost.•••

© सुश्री संध्या बेडेकर 

पुणे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ एक इसापनीती कथा – शहाणे गाढव ☆ श्री जगदीश काबरे ☆

श्री जगदीश काबरे

? इंद्रधनुष्य ?

☆ एक इसापनीती कथा – शहाणे गाढव ☆ श्री जगदीश काबरे ☆

काही व्यापारी गाढवावर माल लादून व्यापार करीत निघालेले होते. सकाळच्या वेळी एका नदीकाठी व्यापाऱ्यांचा मुक्काम पडला. व्यापारी चुली मांडून स्वयंपाक करू लागले. गाढवे चरत होती. त्यांच्या पाठीवर ओझे तसेच होते.

इतक्यात अशी आवई उठली की, ‘चोर आले, पळा, पळा!’ सगळे व्यापारी घाईगर्दीने पळण्याचा प्रयास करू लागले.

गाढवे मात्र शांतपणे चरत होती. तेव्हा व्यापारी गाढवांना म्हणाले, “अरे, चरता काय? चोर आले, डाकू आले, पळा पळा!

चरणाऱ्या गाढवांपैकी एक शहाणे गाढव होते. या शहाण्या गाढवाने मान वर करून व्यापाऱ्यांना विचारले, “का हो, डाकूंनी जर आम्हाला पकडले तर आमच्या पाठीवरचे ओझे वाढणार आहे काय?”

व्यापारी म्हणाले, “तसे काही नाही. जितके ओझे लादता येणे शक्य आहे तितके आम्ही लादलेलेच आहे. अधिक ओझे वाढण्याची शक्यताच नाही.”

तेव्हा शहाणे गाढव म्हणाले, “समजा आम्ही तुमच्याबरोबर पळालो तर आमच्या पाठीवरचे ओझे कमी होणार काय?”

व्यापारी म्हणाले, “तसेही नाही. हे इतकेच ओझे तुमच्यावर राहणार आहे.”

तेव्हा ते शहाणे गाढव म्हणाले, “जर ओझे वाढणार नसेल, कमी होणार नसेल तर मग तुम्हीच पळा. आम्ही चरतो.”

थोडक्यात काय तर, तोंडदेखल्या घोषणा आणि लांबरुंद व्याख्याने यांना काहीच अर्थ नाही. व्यापारी राज्यकर्त्यांचे ओझे जनतेवर जर तितकेच राहणार असेल तर मग घोषणा ‘घराणेशाही हटाव’ असली तरी काय आणि ‘लोकशाही बचाव’ असली काय, त्यात कोणाला रस वाटण्याचे कारण नाही. सर्वसामान्यांच्या दरिद्री जीवनात काही फरक होणार असेल तरच लोकशाहीला अर्थ असतो. एरवी मोठमोठ्या घोषणा ह्या ढोंगी नेत्यांच्या भूलथापाच असतात. त्यांना दुसरा कोणताच अर्थ नसतो. हे जेवढ्या लवकर आपण लक्षात घेऊ तेवढे बरे.

© श्री जगदीश काबरे

मो ९९२०१९७६८०

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ कलियुग काय आहे? – लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती : सौ. गौरी गाडेकर ☆

सौ. गौरी गाडेकर

? इंद्रधनुष्य ?

☆ कलियुग काय आहे? – लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती : सौ. गौरी गाडेकर

कलियुग काय आहे?

कृष्णाने सांगितलेले कलियुग काय आहे?

एकदा चार पांडव (युधिष्ठीर वगळता) भगवान श्रीकृष्णाला विचारतात- “कलियुग काय आहे आणि कलियुगात काय होईल?”

या प्रश्नावर कृष्ण हसला आणि म्हणाला,”कलियुगात काय परिस्थिती असेल त्याचे मी तुम्हाला प्रात्यक्षिक दाखवतो.”

.. असे म्हणून त्याने आपल्या भात्यातून चार बाण घेतले आणि धनुष्याच्या सहाय्याने चार वेगळ्या दिशेला सोडले आणि चारही पांडवांना ते बाण घेवून येण्याची आज्ञा दिली.

सर्व चारही पांडव बाणाच्या शोधात वेगवेगळ्या दिशेने गेले.

जेव्हा अर्जुनाने बाण शोधून तो उचलला तेव्हा त्याला मंजुळ आवाज ऐकू आला. तो त्या आवाजाकडे वळला त्याने पाहिले एक कोकिळा खूप गोड आवाजात गात आहे पण त्याचवेळी जिवंत सशाचे मांस खात आहे, तो ससा खूप वेदना सहन करत आहे…  या दैवी पक्ष्याचे हे घृणास्पद कृत्य पाहून अर्जुनाला धक्का बसला. त्याने ते ठिकाण पटकन सोडले.

भीमाने ज्या ठिकाणाहून बाण उचलला त्या ठिकाणी पाच विहिरी होत्या. एका विहिरीभोवती चार विहीरी होत्या. चार विहिरीतील गोड पाणी त्यांच्यात साठून राहू शकत नसल्याने त्या विहिरीबाहेर पडत होते.पण आश्चर्याची बाब म्हणजे या चारही विहीरी पूर्ण भरून वाहत असताना मात्र मधे असेलेली विहीर कोरडी होती.

.. हे पाहून भीम चक्रावून गेला.

नकूल जेव्हा बाण घेवून माघारी येत होता तेव्हा त्याने एक ठिकाणी पाहिले की एक गाय वासराला जन्म देत आहे. जन्म दिलेल्या वासराला ती गाय चाटू लागली. पण ते वासरू स्वच्छ झाले तरी गाय चाटतच राहते. खूप मुश्किलीने लोक त्या वासराला गायीपासुन वेगळे करू शकले. तेव्हा ते वासरू खूप जखमी झाले होते. हे पाहून नकूल गोंधळून गेला.

सहदेवाने एका डोंगराजवळून बाण उचलला आणि पाहिले तर एक मोठ्ठी शिळा खाली कोसळत आली. ती शिळा खाली येताना वाटेत येणाऱ्या मोठमोठ्या झाडांचा, दगडांचा चुराडा करत होती, पण तीच शिळा एका लहान रोपामुळे थांबली. यावेळी सहदेवही चकित झाला.

…. या चौघांनी या सर्व घटनांचा अर्थ श्रीकृष्णाला विचारला.

श्रीकृष्ण हसला आणि अर्थ सांगितला…

…. कलियुगात धर्मगुरूंचा आवाज खूप मधूर असेल आणि खूप ज्ञानही असेल, पण ते साधकांचे शोषण करतील जसं कोकिळा त्या सशाचे करत होती. “

…. कलियुगात गरीब लोक श्रीमंतांसोबत राहतील. श्रीमंताकडे खूप धन असेल, ठेवायला जागा नसेल, पण ते त्यातील एक कवडीसुद्धा गरीबांना देणार नाहीत.. जसं त्या विहिरींनी कोरड्या विहिरीला एक थेंबसुद्धा दिला नाही.

.. कलियुगात पालक मुलांवर एवढं प्रेम करतील की त्या प्रेमाने मुलं बिघडतील आणि त्यांचे आयुष्य उध्वस्त होईल.. जसं त्या गायीचे प्रेम वासराला त्रासदायक ठरले.

.. कलियुगात माणसे चारित्र्याच्या बाबतीत खूप घसरतील जसे ती शिळा डोंगरावरून घसरली आणि त्यांचे अधःपतन काही केल्या थांबणार नाही. पण सर्वात शेवटी देवाचे नाम त्यांचे संरक्षण करील, त्यांचा उद्धार होईल.. जसं त्या लहान रोपाने त्या शिळेला आणखी खाली जाण्यापासुन रोखले.

“जसे कर्म, तसे फळ.”……

“कितीही विरोध होऊदेत, चांगल्या व योग्य गोष्टींनाच आपला पाठींबा द्या.”….

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती : सौ. गौरी गाडेकर

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ पंचधान्यांची हिरवळ… ☆ श्री दिवाकर बुरसे ☆

श्री दिवाकर बुरसे

? इंद्रधनुष्य ?

☆ पंचधान्यांची हिरवळ… ☆ श्री दिवाकर बुरसे

घटस्थापनेच्या वेळी पत्रावळ किंवा ताम्हणातील वावरीत पेरलेली पंचधान्ये नीट अंकुरत नाहीत. पहिले चार-पाच दिवस तर अंकूर दिसतच नाहीत. आठव्या-नवव्या दिवशी जेमतेम बोटभर गवत उगवते तोपर्यंत घट विसर्जित करायची वेळ येते. त्यामुळे दसऱ्याला धान्यांची हिरवीगार कोवळी लुसलुशीत तृणपाती पांढऱ्या-पिवळ्या शेवंतीसवे केसात खोचून मिरवायला मजा येत नाही अशी अनेक मुली-महिलांची तक्रार असते.

मंडळी, ग्रामीण भागातील महिला अजूनही केसांच्या वेण्या,अंबाडे घालतात. केसात फुले माळतात. शहरी स्त्रियांनी गरज म्हणून, सोय म्हणून, हौस म्हणून, स्टाईल म्हणून बाँबकट, बाँयकट, स्टेपकट, शोल्डरकट, मश्रूमकट यासारख्या ‘कटकटींचा’ शाँर्टकट मार्ग स्विकारल्यामुळे त्यांच्या केसांच्या तक्रारींच्या केसेस कमी झाल्या असतीलही कदाचित, पण या ‘कट’कारस्थानामुळे लांबसडक, दाट, काळ्याभोर केशसंभारावर रंगीबेरंगी सुगंधि फुलांची आरास करण्याच्या आनंदाला बिचाऱ्या मुकल्या आहेत. असो, काळाचा हा महिमा आहे हेच खरं! पण असं असलं तरीही  हाँलमधे सजावटीसाठी त्यांनाही असे हिरवे तृणांकुर मिळाले तर हवेच असतात.

आमच्या घरचा अनुभव सुद्धा एकेकाळी असाच होता पण आता नाही. कारण मी त्यावर एक उपाय शोधला. आता दरवर्षी मी असेच करतो. आपणही करून पहा. मला विश्वास आहे, आपलीही घटाभोवती पेरलेली धान्ये चांगली आठ-दहा इंच उंचीची उगवतील.

तर काय करायचं, घटस्थापनेच्या आधी दोन दिवस ही पंच-सप्त-नव धान्ये म्हणजे गहू, ज्वारी, नाचणी, राळे, नागली सातू, यव, अगदी मूग, मसूर, मटकी, उडीद इ. इ. सुद्धा चालतील, स्वच्छ धुऊन पाण्यात सात-आठ तास भिजवायची. आठ तासानंतर ती पाण्यातून बाहेर काढून, हलकेच पुसून, थोडी कोरडी करून एका स्वच्छ फडक्यात गुंडाळून ठेवायची उबदार जागी. घट बसवायच्या वेळेपर्यंत ही धान्ये अंकुरतील, त्यांना टरारून मोड येतील. अशी आधीच अंकुरलेली धान्ये पहिल्या दिवशी वावरीत पेरली तर सभोवतीची ओलसर माती, हवा, सूर्यप्रकाश यामुळे दुसऱ्या दिवसापासूनच ती जोमाने वाढू लागतील. घट उठेपर्यंत वीतभर किंवा अधिक उंचीची हिरवीगार तृणपाती वर येतील!

यावर्षी हे रहस्य मी घटस्थापनेपूर्वीच  उलगडतोय तुम्हाला तयारीला पुरेसा वेळ मिळावा म्हणून.आठ दिवस आधीच सांगतो मी काय करतो ते. तुम्ही करून पहा आणि सांगा ही आयडियेची कल्पना कशी वाटली ते. सांगा कशाला, सरळ त्याचे फोटो काढून पाठवा. इतरांनाही कळू द्या की तुमचं यावेळचं नवरात्र कसं झालं, दिवसेंदिवस कसं रंगत गेलं आणि दसरा कसा हिरवळला तो!

हो, आणि समजा….

काही राडा झाला, बल्ल्या झाला, गोची झाली तर मला दोष देऊ नका. ‘आपल्याच करण्यात काही तरी चूक झाली’ किंवा ‘आपली धान्ये निकृष्ट होती, जुनाट, मृत होती, माती चांगली नव्हती, पाणी अधिक-उणे झाले’ असं समजून, ते वास्तव  स्विकारून पुढच्यावर्षी पुन्हा हाच प्रयोग करून पहा, यश मिळेपर्यंत प्रयत्न सोडू नका!

सर्वांना नवरात्रीच्या आणि दसऱ्याच्या अनेक शुभेच्छा!

© श्री दिवाकर बुरसे

पुणे

संपर्कः ९२८४३००१२५, ९५५२६२९२४५

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ सातारच्या पेढ्यांना ‘ कंदी पेढे ‘ हे नाव का?… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री सुनिता जोशी ☆

सुश्री सुनिता जोशी

 

? इंद्रधनुष्य ?

☆ सातारच्या पेढ्यांना ‘ कंदी पेढे ‘ हे नाव का?… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री सुनिता जोशी

गोष्ट आहे दीडशे वर्षापूर्वीची. भारतात ब्रिटीश राजवट सुरू होती. साताऱ्यात छत्रपतींच्या संस्थानावर देखील ब्रिटीश रिजंट बसवण्यात आले होते. हे अधिकारी इंग्लंडवरून आलेले होते. त्यांना गोड खाण्याची सवय होती. मग ते कायम वेगवगेळ्या मिठाईच्या शोधात असायचे.

सातारा जिल्ह्यातील जो पाटणकडचा डोंगराळ भाग आहे तिथे त्याकाळात शेतीचं प्रमाण कमी होतं. लोकांचं उपजीविकेचं मुख्य साधन हे पशुधन होतं. तिथल्या गायी म्हशीचं वैशिष्ट्य म्हणजे त्या रानावनात वाढलेल्या होत्या. विकतचा चारा हा प्रकार तिथे नव्हता. यामुळे त्यांचं दुध घट्ट आणि अस्सल असायचं. शिवाय ते मुबलक प्रमाणात उपलब्ध होतं.

हे दुध जवळच मोठं शहर म्हणून सातारला पाठवून दिलं जायचं. काहींनी या दुधाला कढईत उकळून त्यात साखर किंवा गुळ टाकली. हे मिश्रण घट्ट झाल्यावर त्याचे छोटे छोटे गोळे बनवले. ते एका करंडीमध्ये भरून ब्रिटीश अधिकाऱ्यांना पेश केले. ब्रिटीशांना ही मिठाई प्रचंड आवडली.

त्यांना करंडी म्हणता येत नसल्यामुळे त्यांनी त्याला कँडी म्हणायला सुरुवात केली. पुढे याच कँडीचं आपल्या सातारकरांनी “कंदी” केलं.

साधारण याच काळात छत्रपतींच्या नवव्या वंशजानी महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरील खडकलाट या गावातून काही मिठाई बनवणाऱ्या कुटुंबाना साताऱ्यात आणून वसवलं होतं. त्यांनी बनवलेले कंदी पेढे लोकप्रिय होत गेले. पुढे त्यांनाच लाटकर असं ओळखलं जाऊ लागलं.

कंदी पेढ्याला सातासमुद्रापार नेलं ते मात्र तुळजाराम मोदी या हलवायांनी.

त्यांनी सत्तर वर्षांपूर्वी विमानात, लंडनमधील सुप्रसिद्ध ठिकाणी या कंदी पेढ्यांच्या जाहिराती लावल्या. त्यामुळेच हा पेढा कानाकोपऱ्यात पोहोचला.

आजही एवढ्या वर्षांनी एवढी तंत्रज्ञानात सुधारणा होऊनदेखील मोदी आणि लाटकर हलवाई मात्र कंदी पेढ्याचा खवा आजही कढईतच भाजतात व प्रत्येक पेढा हातावरच वळला जातो. खव्याची भाजणी विशिष्ट प्रकारे केल्यामुळे पेढ्याची पौष्टिकता, चव व टिकाऊपणा वाढतो.

म्हणूनच गेली १०० वर्ष सातारच्या कंदी पेढ्यांची चव आणि गुणवत्ता तशीच टिकून आहे. भारतात अनेक ठिकाणचे पेढे प्रसिद्ध आहेत. पेढ्याची जन्मभूमीच मथुरा ही आहे. उत्तरेतून ठाकूर राम रतन सिंह यांनी हे पेढे दक्षिणेत धारवाड येथे आणले. त्यांना धारवाडी पेढे म्हणून ओळखलं जातं.

महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणचे पेढे वैशिष्ट्यपूर्ण आहेत. यात कोल्हापूरचे फिक्के पेढे, कुंथलगिरीचे पेढे, वाडीचे पेढे व खूप काही. मात्र इतर पेढ्यांच्या तुलनेत सातारचे पेढे हे खवा जास्त भाजल्यामुळे भुरकट दिसतात. कमी साखर हे या पेढ्याचे आणखी एक वैशिष्ट्य आहे. परिणामी हा पेढा सहा ते आठ दिवस सहज टिकतो.

सातारच्या कंदी पेढ्याची सिक्रेट रेसिपी म्हणजे हे पेढे डबल भाजलेले आहेत, हे पेढे सह्याद्रीतल्या रानातला चारा खाणाऱ्या गाई म्हशीपासून बनलेले आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे इथल्या पेढ्यांमध्ये सातारच्या माणसांचा “स्वॅग” मिक्स झालाय. या सगळ्यामुळे सातारच्या पेढ्याचा ब्रँड जगात फेमस झालाय.

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती : सुश्री सुनीता जोशी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ शबरी… – लेख क्र. १३ ☆ सौ. मंजिरी येडूरकर ☆

सुश्री मंजिरी येडूरकर

? इंद्रधनुष्य ?

☆ शबरी… – लेख क्र. १३ ☆ सौ. मंजिरी येडूरकर

(अशा स्त्रिया ज्यांच्या कर्तृत्वाची, त्यागाची दखल कधीच घेतली गेली नाही, कौतुकही कधी झाले नाही.)

लग्न म्हणजे किती आनंदाचा दिवस असतो नां! मी त्या दिवशी खूप आनंदी होते. आता मी आईसारखं जुनेर गुंडाळणार! चोळी घालणार! हातात नारनिया, बोटात हंसली, कानात बाळी, नाकात नथनी, गळ्यात कंठा, साखळ्या! खरंच किती दागिने मी घालणार होते! आणि मी तर अज राजाची मुलगी, राजकुमारी! मला कशाची कमतरता कधीच  नव्हती. माझे तर दागिने सगळे चांदीचे, मोत्यांनी वेढलेले होते.पण खरंच मला एवढा दागिन्यांचा आनंद होता कां? पण माझ्या सगळ्या सख्यांना खूप उत्सुकता आणि कौतुक होतं. त्यांना असे दागिने पाहायला मिळायचे नाहीत नां! त्यांचे दागिने म्हणजे साधे लाल हिरव्या मण्यांचे.पण मी कशी दिसेन सगळे दागिने घातले की? त्यादिवशी किती मजा करायची आहे. गाणी गायची, फेर धरून नाचायचं. तेवढ्यात ‘श्रमणा’ हाक ऐकू आली आणि मी एकदम दिवा स्वप्नातून जागी झाले. आई मला वेणी घालायला बोलवत होती. पळत गेले. पण आई वेणी घालताना माझ्या कानावर खूप पशुपक्ष्यांचे ओरडणे ऐकू आले. मला कळेना. वास्तविक मला रानात जायला खूप आवडायचं.सगळ्या पक्ष्यांशी मी गप्पा मारायची. खूप बोलायची. त्यांचं सगळं बोलणं मला कळायचं. सगळ्या झाडांची काळजी घ्यायची, पशु पक्ष्यांची काळजी घ्यायची हे मला खूप आवडायचं. पण आत्ता हा येतोय नां आवाज तो खूप चांगला नाहीये. म्हणजे त्यांचा सुखाचा आवाज नाहीये.काहीतरी त्यांना दुःख आहे असं मला वाटायला लागलं. मग मी आईला विचारलं, “एवढा बाहेर पशुपक्ष्यांचा आवाज कां येतोय? इतके सगळे कां जमलेत?” आई म्हणाली, “अगं! उद्या तुझं लग्न नां, मग सगळ्या पाहुण्यांना, गावातल्या लोकांना मेजवानी नको द्यायला? खूप कुठून कुठून राजे आणि त्यांच्या घरातली सगळी मंडळी येणार आहेत जेवायला. राजकुमारीचं लग्न आहे. मग थाटात व्हायला हवंच की! मेजवानी तर काय लक्षात राहील अशी असणार आहे.” पण माझं आईच्या बोलण्याकडे लक्ष होतं कुठं! मी तर फक्त वेणी पूर्ण व्हायची वाट बघत होते. मी लगेच पळत बाहेर गेले. पाहिलं तर खरंच खूप सारे पशुपक्षी प्राणी पकडून आणले होते. मी आल्यावर त्यांनी माझ्याकडे तक्रार करायला सुरुवात केली. काय करावं मला काहीच कळेना. माझ्या लग्नासाठी इतक्या प्राण्यांनी आपला जीव गमवावा? नाही, असं होणार नाही. ह्यांना वाचवण्यासाठी मला काहीतरी केलं पाहिजे. काय करावे? सगळ्यांना सोडून द्यावं काय? नाही, पिताजींचा क्रोध! भीती वाटते. आपण जर लग्नालाच नाही म्हणालो तर? तेही चालणार नाही. आता सगळ्यांना बोलावणी केली आहेत. सगळी माणसे येणार, नवऱ्या मुलाकडची पण येणार.सगळ्यांना नाही म्हणून सांगायचं हे शक्यच नाही. महाराज आपल्यालाच बांधून ठेवतील. नाही, तसंही नाही चालणार. काहीतरी वेगळं करायला हवं. रात्र झाली सगळी झोपायला गेली. मला कांही झोप येईना. त्या प्राण्यांचे आवाज कानात घुमत होते. काय करावं काही कळेना. शेवटी हळूच उठले. सगळ्या प्राण्यांना मुक्त केलं. मुक्ततेच्या आनंदात त्यांनी ओरडायला सुरुवात केली. बापरे!आता कोणीतरी उठणार आणि आपण सापडणार!

घाबरले, आणि पळत सुटले. वाट सापडेल तिकडे पळाले. पळता पळता जंगलात आले. आता मात्र घुबडांचे आवाज ऐकू यायला लागले.भितीने अंग थरथरु लागलं. तशी खरं म्हणजे मी जंगलाला किंवा प्राण्यांना घाबरणारी नाही. पण मनातली भीती पण होती नां! आपण काहीतरी चुकीचं करून आलोय,ही. माझ्या घशाला कोरड पडली. जवळ कुठे पाणी पण नव्हतं. उजाडेपर्यंत एका झाडावर चढून बसले. उजाडल्यावर पुन्हा काय करायचं? कुठे जायचं? वाटलं, परत घरी जावं. पण आता लग्न होणार नाही. महाराजांची केवढी नाचक्की झाली असेल!त्यात पळून गेलेली मुलगी परत आली तर तिला मृत्यु शिवाय दुसरा पर्याय नसतो. मग चालत राहिले. बऱ्याच वेळानंतर दूरवर घरासारखं काही दिसलं. जवळ गेल्यावर लक्षात आलं हा आश्रम दिसतोय. इथे ऋषी राहत आहेत वाटतं. काय करावं कळेना. मी भिल्ल जातीची. मला कुठे राहायला हे जागाही देणार नाहीत. शेवटी मी जंगलातच राहायचं ठरवलं. रोज पहात होते ते आश्रमातील ऋषीकुमार सगळा आश्रमाचा परिसर झाडून काढायचे, नदीपासून आश्रमा पर्यंतचा रस्ता स्वच्छ करायचे, त्यांना होमासाठी लागणारी समिधा जंगलातून वेचून आणायचे. मग मलाही वाटायला लागलं की आपण काहीतरी यांना मदत करावी. म्हणून मी ते ऋषी कुमार उठायच्या आधीच उठायची. आश्रमापासून नदीपर्यंतचा रस्ता स्वच्छ करून ठेवायची. आश्रमाचा सगळा परिसर स्वच्छ करायची. त्यांना लागणारं सगळं होमाचं साहित्य आणून ठेवायची. त्यांना काही कळेना,की हे काम कोण करतंय रोज! त्यामुळे एक दिवस त्यांनी मला पकडलं आणि मग मातंग नावाच्या ऋषींसमोर उभं केलं. तो त्यांचाच आश्रम होता म्हणे. त्यांनी मला माझी सगळी माहिती विचारली. मी इथे कां व  कशी आले ते मी सगळं सांगितलं. मी शबर जातीची भिल्लीण आहे हे समजल्यावर म्हणाले, ” आज पासून तुझं नांव शबरी! काळजी करू नको. आता मी तुझा पिता! काही लागलं तर मला सांग.” त्यांनी माझी आश्रमातली कामं ठरवून दिली. माझ्यासाठी एक झोपडी बांधून दिली. आता मातंग ऋषींचा आश्रम हेच माझं घर झालं. आश्रमाची सगळी कामं मी करायची. जंगलात जाऊन कंदमुळे फळं आणायची आणि त्यावर गुजराण करायची. त्यावेळी जंगलातल्या पक्ष्यांबरोबर, प्राण्यांबरोबर खूप गप्पा मारायची. असे छान दिवस जात होते. मातंग ऋषी हळूहळू वृद्ध होऊ लागले. मी त्यांना विचारलं, “तुम्ही मला सोडून तर जाणार नाही नां? मी एका पित्याचे घर सोडून आले. आता तुम्ही मला सोडून गेला तर मी कुठे जाऊ?” मातंग ऋषी म्हणाले,” कांही काळजी करू नकोस. कुठेही जायची गरज नाही. या सगळ्या आश्रमाची जबाबदारी आता तुझ्यावर आहे. आणि आता श्रीराम तुझी काळजी घेतील.” ” हे श्रीराम कोण?” ” कळेल तुला! ते येतील तुझ्याकडे. सगळ्या जगाचा आधार आहेत  ते. मग तुला कां नाही आधार देणार!” आणि ऋषींनी देहत्याग केला. मी दुसरा पिताही गमावला.

आता श्रीरामांची वाट पाहत बसले. ऋषी सुद्धा त्यांना आदराने श्रीराम म्हणत होते. कोणी देवासमान व्यक्ती असणार.मी ही मग सतत त्यांच्या नावाचा ध्यास घेतला होता. तो जगाला आधार देतो म्हणत होते. ते कसे दिसत असतील? केव्हा येतील? त्यांना काय आवडत असेल? मी रोज झोपडी समोरची जागा झाडून स्वच्छ ठेवत होते. सकाळी लवकर उठून फुलं आणून त्यांचा हार गुंफून ठेवत होते.त्यांना बसायला रोज नवीन आसन विणून ठेवत होते. कंदमुळे फळं काढून आणून ठेवत होते. प्रत्येक ऋतूत वेगवेगळी फळं मिळायची. कधीकधी कांही चांगली निघायची नाहीत. मला वाटायचं श्रीराम आल्यावर आपण त्यांना दिलेली फळं चांगली निघाली नाहीत तर काय करायचं? मग मी रोज ती चाखून बघायची आणि चांगली असतील तेवढीच एका पानावर ठेवून त्यावर दुसरे पान पालथे घालून ठेवायची. ते आल्यावर गडबड नको व्हायला म्हणून सगळं लवकर आवरून तयारी करून ठेवत होते.

एक दिवस एक वानरांची टोळी आली. त्यांना माझ्या तोंडी रामाचं नांव ऐकून आश्चर्य वाटलं. ह्याच नावाचा जप आमचा हनुमान करतो म्हणाले. मग त्यांनी हनुमानाच्या दैवी शक्तींचं रसभरीत वर्णन केलं. वानरांमुळे मला आता दिशा संकेत कळायला लागले होते.

वर्षा मागून वर्षं गेली पण श्रीराम आलेच नाहीत. आता मात्र माझीही गात्रं वृद्धत्वाकडे  झुकू लागली होती. पण मी निराश होणार नव्हते. मातंग ऋषी माझ्याशी कधीही खोटं बोलणार नाहीत. श्रीराम नक्की येणार. आता डोळ्यात प्राण आणून त्यांची वाट पाहत होते. सतत राम नामाचा जप चालला होता. एक दिवस झोपडीवर बसून कावळा ओरडायला लागला. पाखरांनी अंगण भरून गेलं. त्यांच्या चिवचिवाटानं सारा आसमंत‌  प्रफुल्लित झाला. आणि आपण सोळा वर्षाची तरुणी झालो आहोत असा उत्साह माझ्या अंगात संचारला. श्रीराम येणार अशी खात्री झाली. भराभर सगळी तयारी केली. ते येताना दिसले आणि मी त्यांना ओळखलं. त्यांनीही मला ओळखलं. कुठल्या जन्मीचं नातं होतं कोण जाणे! मी त्यांचे पाय धुतले, फुलांचा हार केलेला घातला. आसनावर बसवलं. आणि अगोबाई, आज फक्त बोरंच मिळाली की! आणि ती पण गडबडीत तशीच ठेवली. ती तर आंबटही असतात. मग त्यांना देऊ कशी? आता काय करायचं? मग सरळ मी बोरं चाखून बघितली आणि मग गोड गोड बघून त्यांना खायला दिली. विचारलं मी, “चालेल नां? माफ करा मला उष्टी द्यावी लागली. माझ्या वेडीच्या लक्षातच नाही आलं.” ते म्हणाले, ” कां नाही चालणार? आणि माफी मी मागायला हवी. माफ करशील नां? तुझा राम नामाचा धावा ऐकत होतो गं, पण काय करू मलाच यायला उशीर झाला. माफ कर मला.” “असं काय बोलता देवा! कुठं निघालाय आता. माझी कांहीं मदत होणार असेल तर सांगा. मला माहित आहे  तसंच कांहीतरी कारण असणार म्हणून तुम्हाला यायला उशीर झाला.” त्यांनी मला सीता हरणाचे दुःख सांगितले. मी त्यांना लंकेची दिशा सांगितली व हे ही सांगितले की वाटेत हनुमान शूर योद्धा आहे. त्याची व त्याच्या सैन्याची मदत घ्या. आता श्रीराम जायला उठले आणि मला रडूच कोसळलं. मी त्यांच्या पायावर डोकं ठेवलं. देवा, मला आता जगायचं नाही. या देहाच्या बंधनातून मुक्त करा. आणि खरोखरंच त्यांनी मला  मुक्त केलं. जन्म मरणाच्या फेऱ्यातून मला सोडवलं. श्रद्धा आणि भक्ती यांचं अमर उदाहरण मागे ठेऊन! कायमचं!!

– लेख क्र. १३.

© सौ.मंजिरी येडूरकर

लेखिका व कवयित्री, मो – 9421096611

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ग्रहणासंबंधित अतिरंजित दावे… ☆ श्री जगदीश काबरे ☆

श्री जगदीश काबरे

? इंद्रधनुष्य ?

☆ ग्रहणासंबंधित अतिरंजित दावे… ☆ श्री जगदीश काबरे ☆

– – ग्रहणासंबंधित अतिरंजित दाव्यांचा भांडाफोड

मानवजातीच्या इतिहासात आकाशातील नैसर्गिक घटनांनी नेहमीच कुतूहल निर्माण केले आहे. सूर्य अचानक काळवंडणे किंवा चंद्राचा पांढरट प्रकाश रक्तवर्णी होणे, ही दृश्ये आजही सामान्य लोकांना चकित करून जातात. आजच्या आधुनिक विज्ञानयुगात आपणास ठाऊक आहे की सूर्यग्रहण व चंद्रग्रहण या पूर्णपणे खगोलशास्त्रीय घटना आहेत. परंतु हजारो वर्षांपासून समाजात यांच्याशी निगडित अंधश्रद्धा पसरलेल्या आहेत. ग्रहणावेळी वातावरण दूषित होते, प्राणिमात्रांवर अनिष्ट परिणाम होतात, गर्भवती स्त्रियांसाठी हा काळ धोकादायक असतो, राहू-केतू सूर्य व चंद्राला गिळतात अशा समजुती अजूनही लोकमानसात ठामपणे आहेत. भारतात तर शिक्षित मंडळीही ग्रहणासंदर्भात असे अनेक अतिरंजीत दावे करताना दिसतात. तेव्हा त्यांना शिक्षित म्हणावे का, हा प्रश्न निर्माण होतो. कारण त्या दाव्यांना कुठलाही वैज्ञानिक आधार नाही हे विविध संशोधन आणि खगोलशास्त्रीय अभ्यासांनी स्पष्टपणे दाखवून दिले आहे.

१) सर्वप्रथम, “ग्रहणाच्या वेळी वातावरण अशुद्ध होते” हा दावा वैज्ञानिक दृष्टीने कसा चुकीचा आहे हे पाहू. सूर्यग्रहण असो किंवा चंद्रग्रहण, हे आकाशीय घटनेमुळे घडते. सूर्यग्रहणाच्या वेळी चंद्र, पृथ्वी व सूर्य यांच्या मधोमध येतो, तर चंद्रग्रहणाच्या वेळी पृथ्वीची सावली चंद्रावर पडते. हे ज्ञान शालेय स्तरावर सगळ्यांना दिलेले असतेच.  सूर्यग्रहणाच्या वेळी काही मिनिटांसाठी पृथ्वीवरील विशिष्ट भाग अंधारात जातो, परंतु याचा हवा, पाणी वा वातावरणाच्या गुणवत्तेवर कोणताही अनिष्ट परिणाम होत नाही, असे नासाच्या (NASA) व भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (ISRO) संशोधनातून स्पष्ट झाले आहे.

The Astronomical Journal मध्ये जेम्स पासाचॉफ यांच्या संशोधनानुसार सूर्यग्रहणाच्या वेळी वैज्ञानिकांना सूर्याच्या कोरोना (Corona) या बाह्य थराचे निरीक्षण करण्याची अनोखी संधी मिळते. वातावरण दूषित होण्याऐवजी विज्ञानाच्या दृष्टीने ही घटना अभ्यासासाठी उपयुक्त ठरते. कसे ते समजण्याविषयी १९व्या शतकात भारतात घडलेल्या एका खगोलीय घटनेची माहिती देण्याचा मोह आवरत नाही.

१८ ऑगस्ट १८६८ रोजी भारतातून दिसणारे खग्रास सूर्यग्रहण झाले होते. या ग्रहणाचे तत्कालीन बॉम्बे प्रेसीडेंसीतल्या विजयदुर्ग किल्ल्यावरून जगप्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ पियरे जॅन्सेन या फ्रेंच शास्त्रज्ञाने निरीक्षण केले. त्या काळात सूर्याच्या रचनेबद्दल फारशी माहिती नव्हती. जॅन्सेन यांनी स्पेक्ट्रोस्कोपच्या साहाय्याने सूर्याच्या प्रकाशाचे विश्लेषण केले. खग्रास सूर्यग्रहणाच्या वेळी सूर्याचा बाह्य थर म्हणजे क्रोमोस्फिअर दिसतो. जॅन्सेन यांनी त्यातून निघणाऱ्या प्रकाशात एक वेगळी पिवळसर रेषा पाहिली. ही रेषा हायड्रोजनच्या रेषेपेक्षा भिन्न होती. ही नवी स्पेक्ट्रल रेषा पृथ्वीवर ज्ञात असलेल्या कोणत्याही घटकाची नव्हती. जॅन्सेन यांनी तो घटक सूर्याच्या वातावरणात असावा असा अंदाज व्यक्त केला. जवळपास त्याच काळात इंग्लंडमधील खगोलशास्त्रज्ञ नॉर्मन लॉक्यर यांनीही हाच स्पेक्ट्रल परिणाम नोंदवला. या नवीन अज्ञात घटकाला ग्रीक भाषेत सूर्य म्हणजे ’हेलिऑस’ या शब्दावरून नाव देण्यात आले—’हेलियम’. जर तुम्ही कधी विजयदुर्गला गेलात तर तिथे या प्रयोगासंबंधीची माहिती एका कळ्या रंगाच्या संगमरवरी शिलेवर नमूद केलेली वाचायला मिळेल.

असो. हे झाले थोडे विषयांतर, आता मूळ मुद्द्याकडे पुन्हा वळूया.

ISRO च्या २०१० मधील अहवालात स्पष्ट केले आहे की सूर्यग्रहणाच्या वेळी काही मिनिटे प्रकाश कमी झाल्यामुळे पृथ्वीवरील तापमान किंचित घटते, परंतु त्या लहानशा बदलामुळे कोणताही प्रदूषणाचा प्रश्न निर्माण होत नाही. म्हणूनच “अशुद्धता” ही धारणा केवळ अंधश्रद्धेवर आधारित आहे. एवंच पृथ्वीवरील हवेच्या रचनेवर, रासायनिक संयुगांवर किंवा ऑक्सिजन-कार्बन डायऑक्साइडच्या संतुलनावर कोणताही परिणाम होत नाही.

खालील संशोधनात ग्रहणावेळी फक्त सूर्यप्रकाश कमी होतो, वातावरण दूषित होत नाही, असे स्पष्ट केले आहे.

NASA. Eclipse 101: What Happens During an Eclipse? (NASA Official Website)

ISRO. Solar and Lunar Eclipses Explained. (Indian Space Research Organisation Publications)

Jay M. Pasachoff, The Solar Corona and Solar Eclipses, The Astronomical Journal, 2009

२) दुसरा दावा म्हणजे ग्रहणकाळात प्राणिमात्रांवर अनिष्ट परिणाम होतो. प्रत्यक्षात अनेक प्राणी व पक्षी नैसर्गिक प्रकाशावर अवलंबून असतात, त्यामुळे अचानक अंधार पडल्याने त्यांचे वर्तन थोडे बदलते. उदाहरणार्थ, सूर्यग्रहणाच्या वेळी काही पक्षी घरट्यात परततात किंवा कीटकांची हालचाल थांबते. मात्र हे बदल तात्पुरते असून त्यातून कोणताही दीर्घकालीन अपाय होत नाही. Journal of Astronomical Society of India मध्ये प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार हे केवळ पर्यावरणीय प्रकाशातील बदलांमुळे होते, वातावरणीय अशुद्धतेमुळे नव्हे. कारण प्रत्यक्षात काही प्राण्यांचे वर्तन प्रकाशावर अवलंबून असल्याने त्यांना तात्पुरते बदल जाणवतात. उदाहरणार्थ, बेडूक आवाज थांबवतात, फुलपाखरे गोंधळून जातात. मात्र हे बदल क्षणिक असतात. ग्रहण संपताच ते पुन्हा नैसर्गिक वर्तन करतात.

२०१७ मधील अमेरिकेतील पूर्ण सूर्यग्रहणावेळी NASA ने प्राण्यांच्या वर्तनाचा अभ्यास केला. प्राणीसंग्रहालयातील सिंह व माकडे काही मिनिटे अस्वस्थ झाले होते, परंतु लगेच पुन्हा नेहमीसारखे वागू लागले. याचा अर्थ असा की, ग्रहणामुळे प्राण्यांचे आरोग्य, जीवनशक्ती किंवा पर्यावरणावर काहीही अनिष्ट परिणाम होत नाही.

Sharma, R. et al. (2018). Animal Behaviour during Solar Eclipse in India, Journal of Astronomical Society of India. — यात स्पष्ट केले आहे की वर्तनातील बदल हे फक्त प्रकाशातील अचानक घटामुळे होतात.

अमेरिकेतील २०१७ च्या सूर्यग्रहणादरम्यान प्राण्यांच्या वर्तनाचा अभ्यास…

NASA. Do Animals React to Solar Eclipses?

३) भारतीय समाजात विशेषतः गर्भवती स्त्रियांवर ग्रहणकाळात कठोर बंधने घातली जातात. “त्वचा नाजूक झालेली असते”, “गर्भावर दूषित वातावरणाचा परिणाम होतो” अशी कारणे सांगितली जातात. परंतु वैद्यकीय शास्त्र या दाव्यांना पूर्णतः नाकारते.

American College of Obstetricians and Gynecologists (ACOG) तसेच Indian Council of Medical Research (ICMR) यांच्या अभ्यासांनुसार गर्भवतींवर ग्रहणाचा काहीही दुष्परिणाम होत नाही. गर्भवती स्त्रीच्या आरोग्यावर परिणाम करणारे घटक म्हणजे आहार, स्वच्छता, मानसिक ताण, रक्तदाब, शारीरिक हालचाल, परंतु ग्रहणाचा त्याच्याशी संबंध नाही.

The Mayo Clinic च्या ‘Pregnancy Myths and Misconceptions’ या अहवालात स्पष्टपणे सांगितले आहे की, ग्रहणकाळात बाहेर पडल्यामुळे गर्भाला काही धोका निर्माण होत नाही. उलट, या भीतीमुळे स्त्रियांना मानसिक ताण येतो आणि तोच आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतो.

थोडक्यात काय तर, गर्भवती स्त्रियांवरील बंधनांविषयीचे विधानही अंधश्रद्धेवर आधारित आहे. वैद्यकीय विज्ञानाने हे स्पष्ट केले आहे की गर्भधारणेदरम्यान आईच्या आरोग्यावर योग्य आहार, व्यायाम, मानसिक शांतता आणि स्वच्छता यांचा परिणाम होतो, ग्रहणाचा काहीही परिणाम होत नाही.

गर्भधारणेशी संबंधित अंधश्रद्धांचा भंडाफोड खालील अभ्यासातून केलेला आहे.

American College of Obstetricians and Gynecologists (ACOG). Guidelines for Pregnancy Care. — ग्रहणाचा गर्भवतींवर कोणताही दुष्परिणाम होत नाही असे स्पष्ट.

Indian Council of Medical Research (ICMR). Health Myths and Facts in Indian Context. — “ग्रहणामुळे गर्भावर परिणाम होतो” ही धारणा वैज्ञानिकदृष्ट्या चुकीची असल्याचे स्पष्टीकरण.

Mayo Clinic, USA. Pregnancy Myths and Misconceptions.

४) शेवटी, भारतीय पुराणकथांमध्ये राहू-केतू हे दोन असुर ग्रहणकाळात सूर्य व चंद्राला गिळतात अशी कथा सांगितली जाते. परंतु खगोलशास्त्रात राहू-केतू हे प्रत्यक्ष ग्रह नाहीत. म्हणून “राहू-केतू सूर्य-चंद्राला गिळतात” हा दावा खगोलशास्त्राच्या दृष्टिकोनातून पूर्णपणे चुकीचा आहे. प्राचीन भारतीय गणितीय खगोलशास्त्रानुसार चंद्र आणि पृथ्वी यांच्या कक्षेतील फरक ५ अंशाचा असल्यामुळे चंद्र पृथ्वीभोवती फिरताना ज्या दोन छेदनबिंदूत पृथ्वीच्या कक्षेला छेदतो त्या पृथ्वी व चंद्राच्या कक्षेच्या छेदनबिंदूंना राहू-केतू अशी नावे देण्यात आली. त्या ठिकाणी सूर्य, पृथ्वी आणि चंद्र एका सरळ रेषेत आले की ग्रहण घडते. त्यामुळे “गिळणे” हा केवळ पुराणकथेतला रूपकात्मक उल्लेख आहे, वैज्ञानिक सत्य नव्हे. Meghnad Saha Institute of Science व Aryabhatta Research Institute of Observational Sciences (ARIES) यांनी प्रकाशित केलेल्या संशोधनातही ग्रहणाचे शास्त्रीय स्पष्टीकरण दिलेले आहे.

ग्रहणाचे शास्त्रीय स्वरूप व गणितीय विश्लेषण करत राहू-केतू हे प्रत्यक्ष ग्रह नसून चंद्रकक्षेचे छेदनबिंदू (Lunar Nodes) आहेत, हे खालील संदर्भ स्पष्ट करतात.

  • Abhyankar, K.D. (1993). Concept of Rahu and Ketu in Indian Astronomy, Indian Journal of History of Science.
  • Aryabhatta Research Institute of Observational Sciences (ARIES). Educational Notes on Eclipses.

    (पुराणातील “गिळणे” हे रूपक असून खगोलशास्त्रात यामागील स्पष्ट गणितीय कारण दिलेले आहे.)

  • Saha, Meghnad. Treatise on Eclipses and Celestial Mechanics.

अशा प्रकारे, ग्रहणाशी संबंधित वातावरणीय दूषितपणा, सर्व प्राणिमात्रांवरील अनिष्ट परिणाम, गर्भवतींसाठी विशेष धोका आणि राहू-केतू गिळणे या सर्व गोष्टी अंधश्रद्धा व पुराणकथांवर आधारित आहेत. आधुनिक खगोलशास्त्र व वैद्यकशास्त्र यावर ठामपणे शिक्कामोर्तब करते की ग्रहण हा केवळ आकाशीय घटकांचा परिणाम आहे; त्याचा आरोग्य, वातावरण किंवा प्राण्यांच्या दीर्घकालीन आयुष्यावर कोणताही अपायकारक परिणाम होत नाही, हे सिद्ध झालेले असतानाही भारतातील अनेक शिक्षित अंधश्रद्ध मात्र हा कुठलाही अभ्यास न करता अशा अनेक अंधश्रद्धा आपल्या मनाशी घट्ट कुरवाळून बसलेले असतात. हे अत्यंत खेदजनक आहे. त्यांनी १९व्या शतकातील गोपाळ गणेश आगरकरलिखित ’सुधारक’ पत्रातील “आमचे ग्रहण अजून सुटलेच नाही.” हा लेख जरूर वाचावा आणि आपल्या डोक्यातील अंधश्रद्धेची जळमटे दूर करावीत.

© श्री जगदीश काबरे

मो ९९२०१९७६८०

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ।। श्री नारद उवाच ।। – नारद भक्ति सूत्रे — लेख १९ आणि २० ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ☆

श्री संदीप रामचंद्र सुंकले

? इंद्रधनुष्य ?

।। श्री नारद उवाच ।। – नारद भक्ति सूत्रे — लेख १९ आणि २० ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले 

॥ श्री नारद उवाच ॥

नारदस्तु तदर्पिताखिलाचारिता तद्विस्मरणे परमव्याकुलतेति || १९ ||”

अस्त्येवमेवम् || २० ||

अर्थ: नारदाचे मत, आपल्याकडून होणारी सर्व कर्मे त्याला (भगवंताला) अर्पण करणे आणि त्या भगवत्स्वरूपाचे थोडेही विस्मरण झाले असता परमव्याकुल होणे हीच भक्ती आणि हीच भक्ति आहे असे नारद मुनी पुढील सूत्रात सांगतात. ( हा त्यांचा अति आत्मविश्वास नाही तर तो त्यांचा अधिकार आहे.)

विवेचन: महर्षी व्यास, गर्ग, शांडिल्य यांचे मत सांगितल्यावर देवर्षी नारद आपलेही मत प्रदर्शित करीत आहेत. येथे नारद स्वतःच एक सूत्रकार आहेत. सूत्रग्रंथात अनेकांची नाना मते सांगितल्यानंतर स्वतः सूत्रकार आपलेही मत सांगत असतो, असे अनेक सूत्र ग्रंथावरून दिसून येते. नारदही येथे आपले मत या सूत्राच्या द्वारा प्रदर्शित करीत आहेत.

जन्माला आलेला मनुष्य (जीव) कर्म केल्याशिवाय जिवंत राहूच शकणार नाही. गीतेत भगवंत देखील म्हणतात की मी सेकंड भर कर्म केलं नाही तर पृथ्वीवर हाहाकार होईल…! ( उदा. समजा सृष्टीतील वारा एक मिनिट वाहायचा थांबला तर काय होऊ शकेल याची कल्पना करून पहावे?) थोडक्यात मनुष्याला कर्म केल्याशिवाय रहाणे शक्य नाही आणि दुसरे म्हणजे निव्वळ कर्म करण्याचाच अधिकार त्याला प्राप्त आहे, त्यापासून निर्माण होणाऱ्या कर्मफळावर त्याचा अधिकार नाही, नियंत्रण नाही. पंचवीस लोकांनी प्रत्येकी दहा आंबे खाल्ले, तर  त्या आंब्यांचा प्रत्येकावर होणारा परिणाम हा स्वाभाविकपणे वेगवेगळा असेल….!

अहो, वेगवेगळ्या बढाया मारणारा मनुष्य आपल्या स्वतःच्या शरीरावर नियंत्रण ठेवू शकत नाही. त्याचे शरीर तो स्वतः चालवू शकत नाही. आणि कर्मावर अधिकार हवा अशी अपेक्षा करीत असतो, हे नवल नव्हे काय?

श्री तुकाराम महाराज सांगतात,

“चालें हे शरीर कोंणाचिये सत्ते। कोण बोलवितें हरी विण॥१॥

देखली ऐकवी एक नारायण।तयाचें भजन चुकों नको॥२॥

माणसाची देव चालवी अहंता। मीची एक कर्ता म्हणोनिया ॥३॥

वृक्षाचेही पाने हाले त्याची सत्ता। राहिली अहंता मग कोंठे ॥४॥

तुका म्हणे विठोे भरला सबाह्य।उणें काय आहे चराचरी॥५॥”

(अभंग क्रमांक ३०६६, सार्थ तुकाराम गाथा, धार्मिक प्रकाशन संस्था)

थोडक्यात, भगवंताच्या कृपेने, त्याच्या सत्तेनेच प्रत्येक मनुष्य कर्म करीत असतो. त्याच्याशिवाय मनुष्य काहीही करू शकणार नाही.  म्हणून नारद मुनी आपल्याला सांगतात की प्रत्येक कर्म त्या भगवतांच्या चरणी अर्पण करावे.

” जे खासी होमासी देसी, जे जे आचरिसी तप|

जे काही करिसी कर्म ते करी मज अर्पण || “

(गीताई ०९.२७)

मनुष्याने आपली सर्व कर्मे भगवंताला समर्पण करावीत, इथे नारद मुनी थांबत नाहीत, तर ते पुढे सांगतात की अतिव्याकुळ होऊन मनुष्याने समर्पण वृत्ती अंगिकारावी. त्याचा क्षणभर विसर सुद्धा होऊ नये. सतत त्याचेच स्मरण असावे. गर्भवती स्त्री  वावरताना सतत तिच्या गर्भाचा विचार करीत असते. आपल्या गर्भाला बिल्कुल त्रास होऊ नये असा तिचा प्रयत्न असतो. तिच्या मनात कायम गर्भाचा विचार असतो. त्या गर्भाच्या निकोप वाढीसाठी ती अनेक बंधने, नियम आनंदाने पाळते…..! त्यासाठी ती कितीही काकुळतीला जाऊ शकते. साधकाने अशा प्रकारे भक्ति करून आपले हित साधावे असे नारद मुनी सुचवीत आहेत.

संत तुकाराम महाराज आपल्या एका अभंगात म्हणतात..

” हेचि दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा “

भक्ताला जसा भगवद्वियोग सहन होत नाही तसा विसरही खपत नाही. विस्मृती हाही एक मानसिक वियोगाचाच प्रकार आहे असे म्हटले तर काही बाधक नाही. तात्पर्य, मानापमान, लाभ, हानि, सुख-दुःख इत्यादिकांची पर्वा न करिता कर्तृत्वाभिमान व फलेच्छा टाकून, शरीर व शरीरसंबंधी असलेल्या अहंता, ममतेचा त्याग करून एकमात्र भगवंताला परमप्रियतम मानून त्यासच परमआश्रय, परमगती, परमसुहृद समजून अनन्य भावाने अत्यंत श्रद्धायुक्त होऊन प्रेमपूर्वक तैलधारेप्रमाणे त्याच्याच नामगुण प्रभाव व स्वरूपाचे चिंतन करीत परमानंदात निमग्न राहाणे व केवल त्या प्रियतमाकरिता त्याच्या इच्छेनुसार त्याच्याच करिता निःस्वार्थ भावाने समस्त दैहिक, वाचिक, मानसिक कर्माचे आचरण करीत राहाणे, काही प्रतिकूल निमित्ताने क्षणभरही त्याचे विस्मरण होईल तर पाण्यातून बाहेर काढलेल्या मासोळीपेक्षाही अधिक व्याकुलता उत्पन्न होणे हीच भक्ती असे नारद महर्षी आपले स्वतःचे मत सांगतात.

असा भक्त देवाला म्हणतो, “तू जसा ठेवशील, तसा राहीन, पण तुझा बनून राहीन…”

जय जय रघुवीर समर्थ

नारद महाराज की जय!!!

– भक्ती सूत्रे क्र. १९/२०

© श्री संदीप रामचंद्र सुंकले (दास चैतन्य)

थळ, अलिबाग. 

८३८००१९६७६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ सेनेचे भूषण…मेजर चंद्रभूषण द्विवेदी!..! ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

☆ सेनेचे भूषण…मेजर चंद्रभूषण द्विवेदी!..!..! ☆ श्री संभाजी बबन गायके 

 

सेनेचे भूषण…मेजर चंद्रभूषण द्विवेदी!

२ जुलै १९९९ ची रात्र. अंधार माजल्यासारखा अधिकाधिक मिट्ट होत चाललेला. दिवसभर धडाडणा-या तोफा आता थंड करण्याचा,रात्रभर विश्रांती घेण्याचा आणि दिवस उजाडताच पुन्हा मारा सुरु करण्याचा त्यांच्यापुढे एक पर्याय होता…पण तो त्यांनी स्वीकारला नाही. आजचा तसा तिसरा दिवस होता. तोफा आणि तोफा डागणारे सैनिक, त्यांचे नेतृत्व करणारे अधिकारी यांनी क्षणभर विश्रांती घेतलेली नव्हती. कारण यांनी खालून वर तोफगोळे डागले नाहीत, तर पहाडांवर चढत जाणारे पायदळाचे सैनिक उंचावरून येणा-या पाकिस्तानी गोळीबाराला बळी पडणार होते, हे निश्चित. युद्धाचे सुद्धा एक तंत्र असते. शत्रू त्यांच्या सुरक्षित खंदकामध्ये आरामशीर बसून आपल्या सैनिकांवर गोळीबार करत असताना आपला तोफखाना शत्रूला तुफान बार उडवत  भाजत राहिला म्हणजे त्यांना गोळीबार करण्यात अडचणी येतात…आणि शत्रू असा अडचणीत सापडल्याचा फायदा घेत आपले सैनिक आगेकूच करीत करीत त्यांच्या नरडीचा घोट घेण्यासाठी त्यांच्या अधिकाधिक जवळ पोहोचू शकतात! आणि म्हणूनच हा तोफांचा मारा थांबला म्हणजे आपल्या सैनिकांना असणारा धोका वाढत जाणार!

१४ मे १९९९…  ३१५, फिल्ड रेजिमेंट (आर्टीलरी) कारगिल युद्धाच्या आरंभी द्रास सेक्टर मध्ये उतरवली गेलेली पहिली फिल्ड रेजिमेंट ठरली!  पाकिस्तानी घुसखोरांच्या वेशात भारतात घुसलेल्या पाकिस्तानी सैन्याला हुसकावून लावण्याच्या कामात इतर चार रेजिमेंटस व्यग्र झाल्या होत्या. तोलोलिंग, point 5140, black tooth, टायगर हिल, गन हिल- point 4875 ही महत्त्वाची ठाणी ताब्यात घ्यायला 1 Naga, 8 Sikh, 17 Jat, 16 Grenadiers निघाल्या होत्या आणि ३१५,फिल्ड रेजिमेंट (आर्टीलरी) वर या चार रेजिमेंटसला साहाय्य पुरवण्याची (Artillery Support)  देण्याची मोठी जबाबदारी दिली गेली होती. ज्या जागेवरून तोफा उडवल्या गेल्या ती जागा शत्रूच्या लक्षात यायला वेळ लागत नाही…मग शत्रूही या जागेवर मारा सुरु करतो. म्हणून तोफांचा जागा सातत्याने बदलत ठेवावी लागते..आणि हे काम अतिशय जिकीरीचे असते…पण तरीही मोठ्या त्वेषाने केले जाते!

रात्र सुरु झाली…आणि आपले सैनिक लक्ष्याच्या समीप पोहोचू पहात होते…वरून पाकिस्तानी मारा सुरु होता…अशावेळी खालून त्यांच्यावर अचूक मारा होणे गरजेचे होते…तसा संदेशही दिला जात होता…दिवसभर तोफा चालवून सैनिक थकलेले होते…सेकंड-इन-कमांड मेजर चंद्रभूषण द्विवेदी साहेब त्यांच्या तंबूत क्षणभर विसावले होते…संदेश कानी पडताच ते तंबूबाहेर धावले…त्यांनी स्वत: एका तोफेचा ताबा घेतला आणि ते फायरींग करू लागले…इतर तोफांतूनही  तोफगोळे सतत आणि अचूक डागले जात आहेत, हे पहात होते…शाब्बास…शाब्बास…फायर! अशा आरोळ्या सुरु होत्या! थांबून चालणार नव्हते…त्यांच्या कवर फायरच्या आधारे जवान इंचा-इंचाने शत्रूकडे सरकत होते…रात्रीच्या अंधारात! भारताकडून तोफांचा मारा काही क्षण जरी थंडावला असता तरी शत्रूला खाली गोळीबार करण्याची उसंत लाभली असती.

सर्व काही सुरळीत सुरु होते….पण शत्रूला आपल्या तोफखान्याची जागा समजली होती….त्यांनी नेम साधला…एक तोफगोळा नेमका साहेब ज्या गनवर काम करीत होते…तिच्या अगदी शेजारी येऊन आदळला…अर्थात मोठा स्फोट झाला…साहेबांचा हातात आणि शरीरात त्या गोळयाचे अणकुचीदार तुकडे मोठ्या वेगाने घुसले…रक्ताच्या चिळकांड्या उडाल्या…पण साहेब थांबले नाहीत…शेवटच्या श्वासापर्यंत आदेश देत देत तोफांचा भडीमार करीत राहिले…साहेबांच्या खांद्याला खांदा लावून अहोरात्र लढत असणारे लान्स हवालदार मलय्या, नाईक सरवन कुमार, नाईक बिश्नु राय, लान्स नाईक गोपय्या, गनर राजकुमार, गनर सिंघा यांनी सुद्धा तिथेच शेवटचे श्वास घेतले!

आज या बलिदानांना पंचवीस वर्षे पूर्ण झालीत…कारगिल युद्धातला हा एक मोठा निर्णायक प्रसंग होता! मेजर चंद्रभूषण विन्धेश्वर द्विवेदी साहेब मरणोत्तर सेना मेडलचे मानकरी ठरले. बिहार मधील पूर्णिया मध्ये जन्मलेले चंद्रभूषण हे देशाचे भूषण ठरले. सुट्टीवर असताना द्विवेदी साहेब अत्यंत कुटुंबवत्सल आणि सीमेवर अत्यंत कर्तव्यकठोर असत. त्यांची थोरली कन्या नेहा डॉक्टर असून एका सैन्याधिकारी साहेबांशी त्या विवाहबद्ध आहेत. तर  धाकटी कन्या दीक्षा लेखिका आहे. दीक्षा यांनी त्यांच्या पित्याने त्यांना सीमेवरून पाठवलेल्या पत्रांचा संग्रह पुस्तक रूपाने प्रकाशित केला आहे.

…… हुतात्मा मेजर चंद्रभूषण आणि त्यांच्या सहकारी हुतात्मा सैनिकांना आजच्या स्मरणदिनी भावपूर्ण श्रद्धांजली! जय हिंद ॥

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares