आज अनिताकडे पार्टी आहे . तिच्या आणि अजयच्या ओळखीच्या पाच फॅमिलीज् येणार आहेत . त्यामुळे सकाळपासून तयारी सुरू आहे .
पहिल्यांदाच सर्वांना घरी बोलविण्याचा बेत तिने ठरविला . नाहीतर महिन्यातून एकदा सर्व मित्र बाहेर हॉटेलमध्ये भेटतात. गप्पा टप्पा मारतात , आणि रिचार्ज होऊन घरी येतात . हॉटेल असेच शोधतात जेथे मुलांना मस्ती करायला भरपूर जागा असेल.••••
या सर्व कार्यक्रमात आजी-आजोबा घरीच राहतात , त्यांना रात्रीचे बाहेर जाणं , उशीरा जेवणं तेवढं झेपत नाही .. यावेळेस अनिता-अजयने घरीच बोलविण्याचा प्लान ठरविला. ज्या परिवारात आजी आजोबा आहेत त्यांनाही आमंत्रण दिले .
सर्वांच्या सोयीनुसार दुपारच्या जेवणाचा बेत ठरविला. आपल्या मनोरंजनाची पद्धत थोडी बदलावी ,असं तिच्या मनात होतं .
घरचे जेष्ठ ,Retired from work जरी असले तरी They are not retired from fun,
असं तिचं मत आहे . नेहमी आपण बाहेर जातो ,ते काहीही तक्रार न करता घरी राहतात . येताना आपण त्यांच्या आवडीचे आइस्क्रीम आणले, तरी अगदी आनंदाने ते त्या रात्री किंवा दुसऱ्या दिवशी खातात .
त्यांचे बाहेर जाणं कमी झालेलं आहे . बदल, change प्रत्येकाला आवडतोच .
आपण आपल्या पद्धतीत थोडा बदल केला तर त्यांना पण आपल्यात सामावून घेता येईल .हा विचार अनिताच्या मनात होताच.
खरंतर दोन चार दिवसांपूर्वी घडलेल्या एका घटनेनं हा बदल करण्याचा विचार तिच्या मनात आलेला अजून दृढ झाला.
परवा आजोबांचे चार मित्र त्यांच्या तब्येतीची चौकशी करायला म्हणून घरी आले, तर अनिताच्या मुलीने म्हणजे प्रियाने खाडकन आपल्या खोलीचा दरवाजा बंद केला . हे अस वागणं बरोबर नाही. खरंतर पंधरा वर्षांच्या प्रियाने सर्व आजोबांना हसून नमस्कार करणे आणि त्यांना पाणी आणून देणे एवढ करणं तरी नक्कीच अपेक्षित होतं .
बरं ! आजच्या मुलांना लेक्चर देऊन चालत नाही .ऐकतील की अजून बिथरतील सांगता येत नाही .
मुलांना आपल्यापेक्षा लहान मोठे सर्वांबरोबर व्यवस्थित वागता आलं पाहिजे . थोडं बहुत काम करायची सवयही असलीच पाहिजे. आज समोर दिसणाऱ्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही .
तेव्हा घरी गेटटूगेदर करायचे तिने ठरविले .
जेव्हा तिने हा विचार आपल्या मैत्रिणींमध्ये मांडला ,तेव्हा सगळ्यांना तो एकदम पटला असं झालं नाही . वेगवेगळ्या प्रतिक्रिया आल्या .•••••
“अग ! ते खूप बोलतात . आपल्याला फ्रीली बोलता येणार नाही .” “त्यांच्या कडे लक्ष द्यावे लागते . आपला अर्धा वेळ त्यातच जाईल .” “मग रोजच्या सारखंच होणार ना , बदल कुठे झाला ?” “त्यांना लवकर जेवायचे असते . रात्रीचे झेपत नाही” वगैरे वगैरे .
अनिता म्हणाली “अग! आपण थोडा बदल करून तर बघू . माझ्या घरी सुरुवात करू .अग! जमेल सर्व .मी करते तयारी . त्यांना ही बरं वाटेल . मुलांनाही मदतीला घेऊ.”
रश्मी कशीबशी या प्लॅनसाठी तयार झाली.
आज देशपांडे आजी आजोबा , कुलकर्णी आजी आजोबा ,जाधव आजोबा, आणि देशमुख आजी आनंदात होते .आणि आश्चर्य चकितही होते.
मुलांबरोबर लग्नाला जाणे , एखाद्या कार्यक्रमात जाणे, यांची त्यांना सवय आहे. पण मुलांबरोबर त्यांच्या मित्रांच्या पार्टीला जायचे होते . उत्साह तर होता, बरोबर थोडं टेंशन ही होतं.
पार्टी छान झाली . सर्वांनी enjoy केलं . लहान मुलांनी खूप धमाल केली. बरोबर त्यांची मदतही झाली .आजी आजोबांकडे लक्ष द्यायचे काम त्यांनी छान केले .
सिनीयर्सची आपापसात छान ओळख झाली . गप्पा झाल्या .यंग जनरेशनच्या मनसोक्त गप्पा रंगल्या . हॉटेलपेक्षा हे option छान आहे . छान हातपाय पसरून गप्पा मारता येतात, हे सर्वांना पटलं .
फॅमिली गेटटूगेदर छान रंगलं.
दुपारच्या चहानंतर अंताक्षरीचा कार्यक्रम झाला. तरुण वर्ग, बच्चा पार्टी आणि आजीआजोबा ग्रुप असे तीन गट होते . सर्वांनी धमाल केली .आजी आजोबांनी जुनी गाणी छान म्हटली .
अगदी अंगाई गीत ,मंगलाष्टक तर
*जा मूली जा दिल्या घरी तू सुखी रहा .
*केतकीच्या बनी तिथे नाचला ग मोर
*घट डोईवर ,घट कमरेवर •••
शेवटचं देशपांडे आजींचे गाणं ऐकून तर सर्वांच्या डोळ्यात पाणीच आले .गाणं होतं ••••
*घरात हसरे तारे असता ,मी पाहू कशाला नभाकडे.•••*
शेवटी देशपांडे आजोबा म्हणाले ,”धन्यवाद मुलांनो, आज तुमच्यात सामील केल्याबद्दल. आज खूप दिवसांनी नवीन गाणी ऐकायला मिळाली . आम्ही दहा वर्षांनी लहान झालो.
Hope ,We have not troubled you.”
प्रियाने सर्वांसाठी चहा केला. त्याचं तर खूपच कौतुक झालं .
अनिताने ज्या उद्देशाने हे पाऊल उचलले , त्याची सुरुवात योग्य दिशेने झाली आहे हे तिच्या लक्षात आले.
म्हणतात ना •••
समज आणि समजूत यापैकी एक गोष्ट जरी माणसाजवळ असली तरी प्रश्न सहज सोडविता येतात.
माणसाने वेळेसोबत चालावे. काळाप्रमाणे बदलावे,परंतु आपल्या संस्कारांना शेवटपर्यंत आपल्या सोबत ठेवावे.
लेखिका :सुश्री.संध्या बेडेकर
संग्राहिका : सौ. उज्ज्वला पई
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
दोन दिवसांनी तो घरी आलेला. दहा बाय बाराचं त्याचं घर. बायको, लेक आणि तो.
त्याच्या खोलीबाहेरची ती गॅलरी. दरवाजाला लागून गॅलरीत आडवी पडलेली कॉट. कॉटवरचा त्याचा म्हातारा बाप. आयुष्यभर हातगाडी खेचत रस्ता मागे ढकलला त्यानं. थकला तो आता.. पायातलं त्राणच गेलंय त्याच्या आता. खुरडत खुरडत रांगत जातो तो.. अगदीच परावलंबी नाही तो… जरी असता तरी काळजी नव्हती. त्याचा खूप जीव होता बापावर.
त्याच्यासाठी वाट्टेल ते केलं असतं त्यानं.
त्याची बायकोही त्याच्यासारखीच.
सासरा नाही माझा बापच आहे असं समजणारी.
म्हातारा बिचारा कॉटवर बसलेला असायचा दिवसभर.
नातीला गोष्ट सांगायचा..
बापानं काबाडकष्ट केले म्हणून..
तो बारावी सायन्स तरी झाला.
पुढचं शिक्षण नाही झेपलं त्याला. आणि
तसा डोक्यानं मध्यम.
नोकरी नाही म्हणून घरी बसला नाही. पेपरची लाईन टाकायला सुरवात केली.
साहेब….
खरं तर साहेब त्याच्यापेक्षा वयानं फार मोठे नाहीत. फार फार चाळीस. पण प्रचंड हुश्शार. फार्माचा धंदा.जोरात चाललेला. फार्मा लेनमधे भलंमोठ्ठं ऑफीस.
एक दिवस साहेबांनी थांबवलं त्याला.
‘किती दिवस पेपर टाकणार आहेस अजून ?
ड्रायव्हिंग शिकून घे. मी पैसे देतो. गाडी चालवायला लागलास की, माझ्याकडे ड्रायव्हर म्हणून काम करायचं. उपकार वगैरे करत नाहीये मी.
तुझ्या पगारातून कापून घेईन मी.”
जमलं.अगदी सहज.
सहज गाडी चालवायला शिकला.
साहेबांकडे कामालाही लागला.
साहेबांना माणसाची चांगली पारख.
साहेब सांगतील तसं…
तो कधीच नाही म्हणायचा नाही.
साहेबांचे दौरे असायचे.
सातारा, कराड, सांगली, कोल्हापूर, बेळगाव…
चार चार दिवस टूर चालायची.
त्याची काहीच तक्रार नसायची.
हातगाडीवाल्याचा पोरगा
आता ड्रायव्हर..
प्रमोशनच की….. आता बऱ्यापैकी पैसा मिळू लागला. झोपडपट्टीतून चाळीची एक खोली. पक्क्या भिंती, पक्कं छत. छान संसार सुरू झाला.
काही महिन्यांनी साहेबांनी एक दिवस पुन्हा बोलावलं.
“किती दिवस ड्रायव्हरची नोकरी करणार आहेस ?
यापुढे तुझी ड्युटी फक्त सकाळी आणि संध्याकाळी.
सहा ते दहा.
मधल्या वेळेत कॉलेज करायचं.
डी फार्मसी करून टाक.
फी मी भरीन. पण हे बघ… पुढच्या पगारातून कापून घेईन..”
साहेबांनी सांगितलं ना..
मग करायचंच.
तीन वर्ष फार ओढाताणीची गेली..
अभ्यास, नोकरी आणि संसार…..
जमवलं कसंबसं.
आणि तो “डी फार्म” झाला.
साहेबांकडची ड्रायव्हरची नोकरी चालू होतीच. रिझल्ट लागला. साहेबांना पेढे नेऊन दिले. साहेब खूष.
“गाडीची किल्ली दे इकडे. उद्यापासून मला ड्रायव्हरची गरज नाही. सिटी हॉस्पीटलमधलं मेडीकल आपण चालवायला घेतलंय. आपला माणूस आहे तिथं..
दोन तीन महिन्यात सगळं शिकून घे. नंतर मात्र तुलाच सगळं सांभाळायचंय..
तीन महिन्यानंतर तुला चांगले पैसे मिळायला लागतील.
आजच सुप्रभा बिल्डरकडे जायचं.
गंगापुररोडला स्कीम होत्येय त्यांची.
मी बोललोय त्यांच्याशी. तिथं एक वन बीएचके बुक करायचा.
असे किती दिवस भाड्याच्या घरात रहायचं ?
हफ्ता तुझ्या पगारातून कट होईल.”
ठरलं तर.
साहेबांनी सांगितलं तसंच होणार.
‘बरं..’
नेहमी तो एवढंच म्हणायचा. आणि चालू लागायचा. आज मात्र तिथंच घुटमळला.
“साहेब,
मी तुमची गाडी चालवली.
तुमी माझ्या जीवनाच्या गाडीला, चांगल्या रस्त्याला लावली.
मी कसं आभार मानू तुमचं ?”
साहेब पहिल्यांदा दिलखुलास हसले…
“म्हणजे मला पण तू ड्रायव्हर करून टाकलंस की.
हरकत नाही..
अरे सगळ्यात मोठा ड्रायव्हर तो श्रीकृष्ण.
मी आपली त्याची कॉपी करण्याचा प्रयत्न करतो.
ते जाऊ दे. उपकाराची परतफेड कशी करणार ?
तू पण कुणाचा तरी ‘ड्रायव्हर’ हो.
तूही चांगला प्रामाणिक माणूस शोध.
त्याला योग्य रस्ता दाखव.
त्याची गाडी मार्गी लाव.
आणि आपल्या कंपनीच्या परिवारात सामील करून घे.”
हे अनमोल मार्गदर्शन ऐकून, सागरापेक्षा मोठा धबधबा डोळ्यात अडवून, तो घरी निघून गेला.
साहेबही निघाले. आज एका सेमिनारला जायचं होतं त्यांना. नवीन उद्योजकांना मार्गदर्शन करणार होते साहेब. विषय होता…
“धंद्यासाठी चांगली विश्वासू माणसं कशी जोडावीत ?”
साहेब नुसतेच हसले आणि निघाले.
इतकी वर्ष साहेबांनी तेच तर केलं होतं…
“धंदे का राज” साहेब आज बिनदिक्कत सांगणार होते…
जीवनात सारथी व्हा …!!!
… कुणाचे तरी..!!
संग्राहिका : सौ. गौरी गाडेकर
संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.
फोन नं. 9820206306
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ कावळा— लेखक :पु. ल. देशपांडे ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆
पाळीव नसूनसुद्धा ज्याच्याविषयी कौटुंबिक कथा भरपूर आहेत, असा ‘कावळा’ हा एकच पक्षी. कारण पिंडाला शिवण्याशी याचा संबंध येतो.
पाळीव नसूनसुद्धा ज्याच्याविषयी कौटुंबिक कथा भरपूर आहेत, असा ‘कावळा’ हा एकच पक्षी कारण पिंडाला शिवण्याशी याचा संबंध येतो.
आमच्या एका मित्राची आजी एकदा (एकदा म्हणजे एकदाचीच) वारली.
आता तिच्या पिंडाला न शिवायचं कावळ्याला काहीही कारण नव्हतं. अहो, चांगले नव्वद वर्षे पाहून म्हातारीने डोळे मिटले होते. मंडळी बुचकळ्यात पडली.
तुझ्या मुला-बाळांची काळजी घेऊ म्हणावं, तर मुलगाच बावीस वर्षे पोस्टातून पेन्शन घेऊन अजून बावीस वर्षे जगेल इतका टुणटुणीत. जगो बुवा! आपल्याला त्याचं काही नाही.पण लेकी होत्या, सुना, नातू , पणतू..
सगळं काही अगदी यथासांग होतं.
मग कोणीतरी उठलं आणि म्हणालं- ” आजीबाई, एक मोठ्ठी लोणच्याची बरणी आणि चार कपबशा आल्या तरच तुमची शालजोडी देईन हो बोहारणीला. “
.
.
.
पटकन् कावळा शिवला…
कावळा हा पक्षी कौटुंबिक गोष्टीत इतका बारकाईने लक्ष घालत असेल याची कल्पना नव्हती मला…
बस सुटणार, एवढ्यात एक तरूण घाईघाईने बसमध्ये शिरला. बसमध्ये फारशी गर्दी नव्हती. हातात गरजेपेक्षा अधिकच्या पिशव्यांनी त्याची तारांबळ उडाली होती. ती थोपवताना त्याने बाजूच्या सीटवर पिशव्यांसकट स्वतःला झोकून दिले. त्याच सीटवर अगोदरच बसलेल्या वृध्दाला अडचण होतेय का,याचा जराही विचार न करता, स्वतःच्या बाजूला आणि त्या वृध्दाच्या अंगावर जाईल इतपत सीटवरच पिशव्या कोंबल्या. तो वृध्द अधिकच अंग चोरून निमूटपणे बसून राहिला. इकडे बाजूच्या सीटवर बसून मीही तो सगळा प्रकार आतल्या आत चरफडत पहात होते.
साधारण तासाभराच्या प्रवासानंतर तो तरुण सामानासह एका थांब्यावर उतरून गेला. तो वृध्द आता थोडा सैल होऊन बसला. झालेल्या त्रासाचा लवलेशही त्या सुरकुतलेल्या चेह-यावर दिसत नव्हता.
न राहवून मी त्या वृध्दाशेजारी जाऊन बसले आणि म्हणाले, ” आजोबा, तो माणूस त्रास होईल असा वागला. स्वतःचे सामान अक्षरशः तुमच्या अंगावर रचले आणि जाताना साधे आभार मानण्याचेही सौजन्य दाखवले नाही. तुम्ही हे एवढे का सहन केले. . ?”
चालत्या बसमधून खिडकीबाहेर पहात त्या आजोबांनी एक दीर्घ श्वास घेतला. क्षणभराने माझ्याकडे पाहिले. चेह-यावर समाधानाचे स्मित आणि नजरेत तृप्तीचे भाव बोलत होते. हलकेच माझ्याकडे बघत ते बोलू लागले,
” आपला प्रवास किती घडीचा असतो?
निर्धारित थांबा आला, की तो किंवा मी उतरून जाणारच होतो. आता तो अगोदर उतरून गेला. मग एवढ्या अल्प घडीच्या प्रवासात वाद कशाला. ? जमेल तेवढा सहप्रवास सुखाने, सामंजस्याने करायचा. त्याचा दोघांनाही त्रास होत नाही. !”
आजोबा बोलत राहिले. मी स्तब्ध होऊन शब्द न् शब्द मनात साठवत राहिले. . .
” बाळ, जीवनाचा प्रवास देखील असाच करता आला पाहिजे. जीवन असतेच दो घडीचे. !
जन्माच्या वेळी वाटल्या जाणा-या मिठाईपासून या प्रवासाची सुरूवात होते आणि श्राध्दाच्या वेळी केलेल्या खिरीवर हा मिठाईचा प्रवास संपतो. बस,हाच जीवनाचा गोडवा. . !
त्याचं विशेष कधीच लक्षात घेत नाही आपण. . !
बाळ,या दोन्ही वेळी आपण स्वतः त्या मिठाईचा स्वाद चाखू शकत नाही. मग मधल्या काळात येणारे कडू-गोड क्षण. . त्याचा सारखाच आनंद घेत जगता आले पाहिजे. !
अनेक माणसं भेटतात या प्रवासात. . त्या प्रत्येकाचे विचार, स्वभाव, आवडीनिवडी अगदी भिन्न असतात. . त्यातली काही अपरिहार्य म्हणून जोडली जातात. त्यात गणगोत, नातलग आले. . काही कसलीही नाती नसताना सहज भेटली तरी ती मनात घर करणारी असतात. कधी जवळचे म्हणणारे साथ सोडतात. . त्यासाठी कारणच हवं, असं काही नसतं. साथ देणारी माणसं निराळी. . त्यांचा पिंड निराळाच असतो. आपण नेहमी लक्षात ठेवावं, अशी साथ देणारी माणसं कारणं सांगत नाहीत आणि कारणं सांगणारी कधी साथ देत नाहीत. . !
जीवन असं विविध अंगांनी समृद्ध होत असतं. . ते जेवढं वाट्याला येईल, तेवढं आनंदानं जगून घ्यावं; म्हणजे कोणी सामानाचे असो, की विचारांचे. . ओझे लादले तरी त्याचा त्रास होत नाही. या प्रवासात निखळ प्रेम करणारी नाती जोडणं ही एक कला आहे. पण ती नाती टिकवून ठेवणं म्हणजे एक साधनाच असते. “
रस्ता मागे पडत होता. आजोबा कधी माझ्याकडे बघत,तर कधी खिडकीतून मागे पळणा-या झाडांकडे. . खिडकीतून दिसेल तेवढे आभाळ नजरेच्या कवेत घेत होते.
थोडा वेळ स्तब्धतेत गेला. ते कसल्यातरी विचारात गढून गेले असावेत. काय बोलावे, म्हणून मीही शब्दाला शब्द जोडण्याची धडपड करत होते.
त्यांनी पुन्हा बोलायला सुरुवात केली,
” बघ ना, लहानपणी प्रवासात झाडे पळत असल्याचा भास व्हायचा. . पुढे वय वाढत गेलं, की सुखाच्या बाबतीतही तेच होतं. . वास्तविक दोन्ही तिथंच असतात. फक्त आपण धावत असतो. !
धावण्याची शर्यत जणू. त्यात कधी कधी धरून ठेवावे, असे हात निसटून जातात. लक्षात येतं, तेव्हा उशीर झालेला असतो. . पण एक मात्र खरं. व पु एके ठिकाणी लिहितात,
” जीवनात नात्यांची गरज एकट्याला असून चालत नाही. ती दोघांनाही असावी लागते. कारण ‘भाळणं ‘ संपल्यावर उरतं ते ‘सांभाळणं. . ‘ हे सांभाळणं ज्याला जमलं, त्यालाच ‘जीवन जगणं’ कळलं. . !”
असं बोलणं किती वेळ सुरू राहिलं असतं, काय माहीत. .
बसचा शेवटचा थांबा आला. दोघेही खाली उतरलो. दोन पावले चालत पुढे आलो आणि त्यांच्या पायावर डोकं ठेवलं. अचानक झालेल्या प्रकाराने ते क्षणभर गोंधळून गेले. . सावरले. दाटल्या स्वरांत म्हणाले, “पोरी, अशी नाती आता दुर्मिळ झाली आहेत गं. . !”
मीही उत्तरादाखल पुटपुटले, ” आजोबा, ज्यांच्या पायावर डोकं टेकवावं, असे पाय देखील दुर्लभ झालेत हो. . !”
दोघांच्या वाटा वेगळ्या दिशेने जाणा-या. .
आपापली वाट चालता चालता आकृत्या धूसर होईपर्यंत दोघेही पुनः पुन्हा मागे वळून परस्परांना निरोपित राहिलो.
” दोन घडीचा डाव, याला जीवन ऐसे नाव. . . “
साैजन्य :सुश्री जयंती यशवंत देशमुख
प्रस्तुती : सुश्री शशी नाडकर्णी -नाईक
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
तुमच्याबद्दल कोणी काहीही बोलले, तरी ते मनाला लावून न घेता, मोठ्या मनाने ‘माफ’ करा.
दुसरे रत्न – विसरा
दुसऱ्यावर केलेले उपकार विसरा. फळाची अपेक्षा करु नका. ‘निःस्वार्थ’ भावना ठेवा.
तिसरे रत्न – विश्वास
नेहमी ‘स्वकष्ट’ आणि ‘निसर्गा’वरअतूट विश्वास ठेवा. हीच तुमच्या यशाची पावती असेल.
चौथे रत्न – नातं
समोरच्याच्या मनाची काळजी आपण आपल्या मनापेक्षा जास्त घेतल्यावर जे निर्माण होतं ते नातं. नात्याला जपा, नात्याला तडा जाऊ देऊ नका.
पाचवे रत्न – दान
नेहमी सढळ हाताने दान करा, दान केल्याने धन कमी होत नाही. उलट दान केल्याने मिळतो मान.आपले मनच आपल्याला दानशूर ही पदवी बहाल करतं.
सहावे रत्न – आरोग्य
दररोज व्यायाम करा, योगासने करा, चालणे ठेवा आणि आपले जीवन निरोगी ठेवा.
सातवे रत्न – वैराग्य
नेहमी लक्षात ठेवा की, ‘जन्म’ आणि ‘मरण’ कधीच कुणालाच चुकलेले नाही. ‘जन्म’ घेतला म्हणजे ‘मृत्यु’ अटळ आहे. वर्तमानात जगा. कोणत्याही गोष्टींचे दुःख कुरवाळत बसू नका. ‘जीवन’ खूप सुंदर आहे, आनंदाने जगा.
माणूस जसा बदलत चालला आहे, तसा निसर्ग देखील बदलत चालला आहे.
निसर्गाची ताकद आहे बघा.निसर्गातील एक विषाणू सांगून गेला, पैसा, संपत्ती, गाडी, बंगला, सोने, श्रीमंती याहीपेक्षा आपला जीव महत्त्वाचा आहे.
ज्याने जोडण्यासाठी कष्ट केलेत,
तो तोडताना दहा वेळेस विचार करतो.
आयतं मिळालं की माणूस एका झटक्यात तोडतो,
मग ती झाडे असो की नाती…
संग्राहिका :सौ. प्रज्ञा गाडेकर
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈