☆ वस्तू वस्तू जपून ठेव – ४ – स्टोव्ह – ☆ विभावरी कुलकर्णी ☆
स्टोव्ह (रॉकेलचा) सारख्या वस्तू आता कालबाह्य झाल्या आहेत. पण आठवणीत मात्र अजूनही आहेत. कारण चूल ते रॉकेल स्टोव्ह हे स्थित्यंतर पाहिले आहे आणि त्यातील सुख अनुभवले आहे. गॅस सिलिंडर येण्यापूर्वी घराघरात याचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जात होता.
या स्टोव्ह चे मुख्य दोन प्रकार असायचे.
१) वातीचा स्टोव्ह – हा अगदी साधा, सुरक्षित! यात सुती वात पेटवण्याची सोय असते. आवाज अजिबात नाही. यात सर्वात खाली रॉकेलची टाकी असते त्यात रॉकेल भरायचे असते. त्याच्या वरच्या भागात गोलाकार वाती असतात. त्या टाकीला तिवई प्रमाणे स्टॅन्ड असतो. त्यावर एक गोलाकार ताटली वातीचा भाग मोकळा ठेवून बसवलेली असायची त्यावर भांडे ठेवता यायचे. त्याची ज्योत लहान मोठी करण्यासाठी वातिच्या खाली एक मोठी किल्ली असायची. निळी ज्योत असली की भांडी काळी व्हायची नाहीत. ज्योतीचा रंग पिवळा झाला की वातीवर काजळी जमली आहे हे कळायचे. मग वाती वरचे झाकण काढून वाती काजळी असलेल्या जागेवर थोड्या कापाव्या लागायच्या. मग तो चांगला पेटायचा.
२) पंपाचा स्टोव्ह किंवा दाबयुक्त स्टोव्ह बोलीभाषेत मात्र त्याला पितळी किंवा फरफऱ्या स्टोव्ह म्हणायचे. कारण त्याला पेटवले की त्याचा मस्त फर्रर्रर्र आवाज यायचा. यालाही एक टाकी असते. त्यावर एक पंप असतो. त्यावर बर्नर असते. त्याला एक छोटे छिद्र असलेले निपल असते. आणि टाकीला जोडलेल्या स्टॅन्ड वर एक भांडे ठेवण्यासाठी ताटली असते. जेथून टाकीत रॉकेल भरायचे तिथे एक छोटे झाकण असायचे आणि त्याला एक किल्ली असायची. रॉकेल टाकीत भरल्यावर पंप मारून हवा भरायची आणि त्या हवेच्या दाबाने रॉकेल निपल मधून बर्नर मध्ये चढायचे. त्या आधी काकडा लावून बर्नर तापवले जायचे. त्यामुळे चढलेल्या रॉकेलचे हवेत रूपांतर होऊन बर्नर भोवती ज्योत पेटायची. या स्टोव्हला काही झाले की प्रथमोपचार म्हणजे त्या निपलच्या छिद्रात पीन करायची म्हणजे तेथील कचरा साफ व्हायचा. मात्र हवा जास्त भरली किंवा बर्नर फुटले तर भडका उडायचा तो थेट घराच्या छता पर्यंत पोहोचायचा. मग सर्वांचीच पळापळ व्हायची. मग तो त्याच्या दवाखान्यात न्यावा लागायचा. आमच्या घरा शेजारी जे दुरुस्तीचे दुकान होते त्या दुकानाला त्याने स्टोव्ह व सायकलचा दवाखाना असे नाव दिले होते.
हा पितळी स्टोव्ह सुद्धा चिंच लावून चकचकित घासला जायचा. आणि घरातील स्टोव्हची चकाकी बघून गृहिणीची स्वच्छतेची आवड ठरवली जायची. मी इयत्ता ९ वीत असताना शालेय अभ्यासक्रमात आम्हाला स्टोव्ह दुरुस्ती विषय होता. शाळेत शिकलेले घरी केलेच पाहिजे. या न्यायाने मी घरी येऊन चांगला उत्तम चालणारा स्टोव्ह खोलला आणि त्याचे सगळे अवयव सगळ्यांना दाखवले. आणि त्याची सफाई कशी करायची, दुरुस्ती कशी करायची हे पण दाखवले. घरात, वाड्यात, शेजाऱ्यांना सर्वांनाच कौतुक वाटले. पण ते थोडाच वेळ टिकले. कारण तो स्टोव्ह म्हणजे त्याचे सुटे भाग काही जोडता येईना. मग तो सुटा स्टोव्ह वडिलांना पिशवीत घालून दुकानात नेऊन जोडून आणावा लागला.
नंतर मैत्रिणीच्या घरी एक साईडला असलेली टाकी आणि दोन बर्नर असा स्टोव्ह वापरला खूप मज्जा वाटायची एकाच वेळी दोन पदार्थ करता यायचे. या स्टोव्ह मुळे नोकरी करणाऱ्या स्त्रियांची सोय झाली होती. आणि चुलीच्या धुरापासून त्यांची मुक्तता झाली होती.
पुढे काही वर्षांनी गॅसची सोय झाली परंतु तोपर्यंत सर्वसामान्यांना या स्टोव्हनेच आधार दिला. अशा जुन्या वस्तूच्या आठवणी! वस्तू कालबाह्य झाल्या पण आठवणी मात्र मनात ताज्या आहेत.
☆ मराठी भाषा समुद्रापलीकडे जावी यासाठी काय करावे? ☆ सौ राधिका भांडारकर ☆
मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला आणि समस्त मराठी मनामनात आनंदाचा सागर उचंबळला. वास्तविक हा मनामनातला आनंद मायमराठी बद्दलच्या अभिमानाचेच प्रतीक आहे पण नुसता भाषेचा अभिमान, अस्मिता बाळगणं पुरेसं नाही तर आपल्या भाषेला जागतिक दर्जा मिळवून देण्याचं प्रत्येक मातृभाषिकाचं कर्तव्य आहे. जगात कितीतरी परकीय भाषा बोलल्या जातात, अभ्यासल्या जातात, मग जगाच्या कानाकोपऱ्यात सातासमुद्रापलीकडेही आपली मराठी भाषा त्याच आत्मियतेने अथवा औत्स्युक्याने, त्यातलं सौंदर्य, संस्कृती, परंपरा जाणून, आपल्या अफाट ग्रंथसंपदेचा मान राखून का अभ्यासली जाऊ नये? आज अनेक मराठी कुटुंबातील मुले परदेशी स्थायिक आहेत. तिथे जन्माला येणाऱ्या मुलांना मराठी भाषा ही त्यांची ही मूळ मातृभाषा आहे याची जाणीव करून देणे हे त्यांच्या पालकांचं कर्तव्य आहे. त्यांच्या शैक्षणिक कालावधीमध्ये परदेशी भाषेला पर्याय नसला तरी जिथे आपलं मूळ आहे त्या भाषेचं ज्ञान असायला हवं याची जाणीव जरी करून देता आली तरी मराठी भाषेसाठी चाललेली चळवळ अर्धी जिंकलो असं म्हणायला हरकत नाही.
तिसऱ्या पिढीशी आपला संवाद जुळला पाहिजे आपल्याच नातवंडांशी आपल्याला बोलता यावं, त्यांच्याशी गप्पा गोष्टी, गमती जमती सांगता, करता याव्यात म्हणून मराठी मातृभाषेची ओळख आणि त्यातून आवड निर्माण करण्याची गरज ही मागच्या पिढीकडून अपेक्षित आहे,
माझ्या नाती माझ्याशी मराठीत बोलू शकतात याचं मला कौतुकच नाही पण अभिमानही वाटतो. त्यांच्या सुट्टीच्या काळात मी त्यांना आंतरजालावर वर्णमाला, बाराखडी, शब्दांची ओळख, जोडाक्षरे आणि वाक्यं लिहायला आणि ओळखायला शिकवली, त्यांना मराठी आलंच पाहिजे हा माझा दुराग्रह नक्कीच नव्हता पण एका सुंदर, आणि त्यांचं मातृमूळ असलेल्या भाषेशी त्यांचं नातं जुळावं म्हणून माझा खटाटोप होता आणि तो नक्कीच यशस्वी झाला. हळूहळू मी त्यांना काही बडबड गीते काही बालगीते शिकवली, भारतातून पुस्तके पाठवली. त्यांनी तर ती वाचलीच पण या मराठी भाषेचे कौतुक त्यांनी त्यांच्या सवंगड्यांपर्यंत पोहोचवले. हे काही थोडकं आहे का?
आज तिथे शनिवार रविवारी काही मराठी संघटनाच्या माध्यमातून अथवा खाजगीरित्या काही तास मराठीचे वर्ग घेतले जातात आणि अशा वर्गात आपल्या मुलांना पालक मराठी भाषेचं जतन व्हावं म्हणून आपुलकीने पाठवतात. तिथे मराठी शब्दांचे उच्चार, पाठांतर, श्लोक पठण, प्रार्थना या माध्यमातून मराठी भाषा शिकवली जाते.
अगदी अलीकडेच एका समारंभात एका मराठी कुटुंबातल्या परंतु जन्माने अमेरिकन असलेल्या तेरा वर्षीय मुलाने शिवरायाचा पोवाडा अस्खलितपणे सादर केला तेव्हा सभागृहातील समस्त मराठी समुदायाने त्याला उभे राहून मानाचा मुजरा दिला.
।ईये मराठीचिये नगरी अवतरली जणू अटकेपार सागरी।।
तिथल्या संपन्न वाचनालयात गेल्यानंतर एका विभागात मला सुप्रसिद्ध मराठी लेखकांची पुस्तके दिसली आणि माझं मन एकदम भरून आलं पण त्यांची अल्पसंख्या पाहून मात्र थोडसं वाईटही वाटलं. हा विभाग इथल्या वाचकांसाठी अधिक समृद्ध करायला हवा त्यासाठी मराठी साहित्य संपदेचा इथे जाणीवपूर्वक भरणा झाला तर मराठी पुस्तकांसाठी एक चांगला वाचक वर्ग तयार होईल.
एक विचार माझ्या मनात आला की इथे जशी ठिकठिकाणी धार्मिक श्रद्धास्थाने मंदिरे आढळतात तशी भाषिक वाचनालये का असू नयेत इथल्या मराठी भाषिकांनी एखादं समृद्ध संपन्न मराठी वाङ्मयाचेच स्वतंत्र वाचनालय सुरू करणे मुळेच अशक्य नाही. शेवटी भाषेचा प्रचार आणि प्रसारासाठी आवश्यक असते ती दर्जेदार सातत्याने होणारी साहित्य निर्मिती आणि मोठा वाचक वर्ग. ही जागरूकता असेल तर भाषा का विझेल? ती निरंतर, चिरंतन राहील. चला तर मग सागरापलीकडे रुजवूया हे रोप मराठी भाषेचे.
☆ मला समजलेली संत तुकारामांची गाथा… भाग – ११ ☆ सुश्री अरुणा मुल्हेरकर ☆
अभंगांतून गीतेचे तत्वज्ञान
देह बुद्धी नष्ट होऊन भक्तिमार्गाने परब्रम्ह प्राप्त झाले, म्हणजे जन्म मरणाच्या चक्रातून माणसाची सुटका होते, हे तत्त्वज्ञान आहे. परंतु तुकाराम महाराजांना पांडुरंगाची अखंड भक्ती करून त्याची सेवाच करायची आहे. त्यांना मुक्तीची चाड नाही, म्हणून त्यांच्या एका अभंगात त्यांनी स्पष्ट म्हटले आहे,
आमुचे उचित/ हेचि उपकार/
आशपुलाची भार/ घालू तुज//
आमच्या योगक्षेमाचा भार देवा तुझ्यावर घालून स्वस्थ बसणे हेच उचित आहे.
मी भक्त व तू माझा हरी, अशी द्वैतभावना तुकाराम महाराजांच्या अभंगातून दिसत असली
तरी अद्वैत झाल्याशिवाय, खरा भक्त असूच शकत नाही हे त्यांच्या अभंगातून दिसणारे गीतेचेच तत्त्व आहे. ते अभंगातून स्पष्ट सांगतात,
दुजेखंडे तरी/ उरला तो अवघा हरी/
आपण बाहेरी/ नलगे ठाव धुंडावा//
इतुले जाणावया जाणा/ कोड तरी मने मना/
पारधीच्या खुणा/ तेणेची जाणाव्या//
तुकाराम बुवा या अभंगात काय सांगतात? मनानेच मनाला जाणले पाहिजे. जो पारधी असतो तो शिकारीचा शोध कसा घेतो, हे दुसरा पारधीच जाणतो. आपला हरी हा आपल्या जवळच आहे, तो दुसऱ्या ठिकाणी शोधायची गरज नाही.
देह आधी काय खरा/ देहसंबंध पसारा/
बुजगावणे चोरा/ रक्षणसे भासते//
तुका करी जागा/ नको वासपू वाऊगा/
आहेस तू अंगा/ अंगी डोळे उघडी//
तुकाराम महाराज निजरूप विसरून एक प्रकारे झोपी गेलेल्यास जागे करतात, आणि सांगतात की तू भिऊ नकोस. अद्वैत रूप हरी तुला सापडेल, कारण तू स्वतःच परमात्मरूप आहेस. तुझी आत्मदृष्टी उघडी ठेवशील तर तुला हा बोध होईल.
थोडक्यात महाराजांना इथे असे सांगायचे आहे, की संपूर्ण विश्वात, चराचरात जो परमात्मा भरलेला आहे, तो तुला तू जर डोळे उघडे ठेवलेस तरच दिसू शकेल. आपल्याला एखादा माणूस सहज कुठेतरी भेटतो, आणि आपली मदत करून जातो. परमेश्वराच्या रूपानेच आपल्याला मदत करण्यासाठी तो आलेला होता याची मात्र आपल्या देहधारी माणसाना जाणीव नसते.
भगवंताने अर्जुनाला काय सांगितले?
“तुझे सर्व कर्म मला अर्पण कर.” तुकाराम महाराजही मुमुक्षुंना हेच सांगत आहेत.
आहे ते सकळ/ कृष्णासी अर्पण/
नकळता मन/ दुजे भावी//
म्हणून पाठे/ लागतील भुते/
येती गिवसित /पाच जणे/
(पंचमहाभूते, ज्यापासून माणसाचे शरीर बनले आहे)
ज्याचे त्या वंचले/ आठव न होता/
दंड हा निमित्त कारणे/ तुका म्हणे//
अर्थात सर्व कर्मे हरीची असून त्याची त्याला अर्पण करायची आठवण न ठेवल्यामुळे, माणूस जन्म मरणाच्या चक्रात सापडतो, त्याला दंड मिळतो.
तुकाराम महाराज पुन्हा पुन्हा गीतेत आलेल्या धर्म रक्षणाचे महत्त्व जीवनात का आहे ते त्यांच्या अभंगातून सांगतात, त्याचप्रमाणे शांत मनोवृत्तीचे महत्व ते समजावून सांगतात.
शांती परते नाही सुख/ येर अवघेची दुःख/
म्हणवुनी शांती धरा/ उतराल पैलतीरा//
अंगी भरती आधी व्याधी/ तुका म्हणे त्रिविध ताप/ मग जाती आपोआप//
मन जेव्हा शांत असेल, त्याचवेळी सर्व दुःखांचा नाश होऊन पैलतीरास जाणे सोपे होईल.
साळंकृत कन्यादान/ पृथ्वीदानाच्या समान/
परिते न कळे या मुढा/ येईल कळो भोग पुढा//
आचरता कर्म/ भरे पोट राहे धर्म/
सत्या देव साहे/ ऐसे करूनिया पाहे//
अन्न मान धन/ हे तो प्रारब्ध आधीन/
तुका म्हणे सोसे दुःख/ आता पुढे नासे//
गीतेतील कर्मयोग महाराजांनी या अभंगात भक्तांना सांगितला आहे. या ठिकाणी त्यांनी तत्कालीन वर्णाश्रमधर्माचे महत्त्व लक्षात घेतले आहे. प्रत्येकाने आपल्या धर्माला अनुसरूनच कर्म केल्याने दुःख राहत नाही असा या अभंगातून त्यांनी उपदेश केला आहे.ज्याप्रमाणे
कृष्णाने पार्थास त्याच्या क्षात्र धर्माचे पालन करण्यास सांगितले.
(पूर्वसूत्र- वखरे साहेबांनी माझ्या डोक्यावरचं ओझं किती अलगद उतरवून घेतलं होतं! त्यांचे आभार मानून मी जायला वळणार एवढ्यांत त्यांनी मला थांबवलं.
“लिमये, माझ्या घरच्या जबाबदाऱ्या अजून पूर्ण व्हायच्यात. त्या तशा झाल्या असत्या तर मीही तुम्ही घेतलाय तसाच निर्णय घेतला असता. सोs यू आर आॅन राईट ट्रॅक. गो अहेड. ऑल द बेस्ट. एन्जॉय अॅंड बी हॅप्पी! ” ते म्हणाले होते.
त्यांचे शब्द माझ्यासाठी सदिच्छाच नव्हते फक्त तर त्यांच्या तोंडून ‘तो’ च देत असावा असे आशीर्वादही होते!)
मनाला स्पर्शून गेलेला हाच विचार सोबत घेऊन मी माझ्या केबिनमधे आलो. आता इथला आपला अन्नाचा शेर अल्पकाळाचाच. जाण्यापूर्वी सगळी कामं पूर्ण करायला हवीत. असा विचार करीत मी बसायला माझी खुर्ची ओढली एवढ्यांत माझ्या लक्षात आलं की आजच्या
इनवर्ड मेलमधे आलेलं माझ्या नावाचं एक बंद एन्व्हलप शिपायाने आधीच तिथं माझ्या टेबलवर पेपरवेटखाली ठेवलेलं होतं. पाहिलं तर ते आमच्या नागपूर रिजनल आॅफिसकडून आलेलं होतं. मी ते न फोडता तसंच बाजूला सरकवून पुन्हा त्यावर पेपरवेट ठेवून दिला. आणि माझ्या समोरची इतर महत्त्वाची कामं हातावेगळी करायला सुरुवात केली. कारण त्या पत्रात बाकी दुसरं कांही नसणार हे गृहितच होतं. याआधीही नागपूर रिजनल ऑफिसकडून मला साधारण दोन महिन्यांपूर्वी एक पत्र आलं होतंच. आमची अकोला ब्रॅंच नागपूर रिजनच्या अखत्यारीत होती आणि अकोल्याला माझी ट्रान्स्फर व्हायला निमित्त ठरलेल्या अनियमित कर्ज खात्यांबद्दल जे गंभीर प्रश्न निर्माण झालेले होते त्यामुळे होणाऱ्या बॅंकेच्या आर्थिक नुकसानीला कोण जबाबदार हे ठरवण्याचे प्रोसेस पूर्वीच सुरू झालेले होते. त्या कार्यप्रणालीचाच एक भाग म्हणून आधी आलेले ते पत्र! त्या पत्रात ‘तुम्ही तेथे मॅनेजर म्हणून कार्यरत असताना या बुडीत होऊ पहाणाऱ्या कर्जांची वसुली करण्यासाठी आवश्यक पावले उचलली गेली नव्हती असे निदर्शनास आले आहे. याबद्दलचे आपले म्हणणे आठ दिवसांच्या आत लेखी कळवावे’ असे सूचित केलेले होते. ते पत्र वाचून भीति वाटण्याऐवजी तेव्हा मला हसूच आले होते. कारण मला तो कागदी घोडे नाचवण्याचा हास्यास्पद प्रकारच वाटला होता. खरंतर या गंभीर त्रुटी मी तिथे चार्ज घ्यायच्या आधीच आॅडिटमधेच रिपोर्ट झाल्या होत्या. त्याला जबाबदार असलेल्या आधीच्या मॅनेजरची तेथून उचलबांगडीही झाली होती. आणि ती घाण उपसण्यासाठीच माझी तिथे बदली झाली होती. सेन्ट्रल ऑफिसच्या सूचनेप्रमाणे सहा कर्जखातेदारांविरूध्द क्रिमिनल केसेस् दाखल करून इतर थकीत खातेदारांविरूध्दही वसुलीच्या नोटिसा पाठवून मी पाठपुरावा सुरूही केलेला होता. त्या ब्रँचमधल्या पाच महिन्यांच्या अल्पवास्तव्यात एक जबाबदार ब्रॅंच मॅनेजर म्हणून जे करायचे ते वेळोवेळी रिजनल ऑफिस आणि सेंट्रल ऑफिस या दोघांचेही मार्गदर्शन घेऊन मी तत्परतेने केलेले होते आणि प्रत्येक खात्याबद्दलची रिपोर्टिंग्जही त्या त्या वेळी सर्व वरिष्ठ कार्यालयांना पाठवत आलो होतो. या सगळ्याची मुद्देसूद सविस्तर माहिती देऊन ‘मी माझ्या कर्तव्यात कोणतीही कसूर केलेली नसल्याने होणाऱ्या आर्थिक नुकसानीला मला जबाबदार ठरवता येणार नाही’ असे त्या पत्राला उत्तर दिले होते त्यालाही दोन महिने होऊन् गेले होते. त्यामुळेच आज मला आलेलं ते समोरच्या इन्व्हलपमधलं पत्र हे मी पूर्वी पाठवलेल्या त्या लेखी उत्तराची पोच आणि त्या प्रश्नाला रिजनल आॅफिसने दिलेली क्लिनचीट असणार याबद्दल मला शंका नव्हतीच. पण…?
पण साधारण तासाभराने मला इतर कामांमधूनच थोडा निवांतपणा मिळताच मी ते एन्व्हलप फोडून आतलं पत्र वाचलं आणि मला हादराच बसला. ते मला वाटलं होतं तसं साधं पत्र नव्हतं. ती मला आलेली एक नोटीस होती. क्षणभर कां होईना कांहीतरी अभद्र घडत असल्याच्या आशंकेने मी अस्वस्थ झालो.
‘तुम्ही सदर कर्ज खात्यांबाबतचा पाठपुरावा समाधानकारक केलेला नसल्यामुळे तुम्ही मांडलेली कैफियत स्वीकारता येणार नाही. ‘ असे नमूद करून ‘ सदर खात्यांमधील अनियमितता आणि आर्थिक नुकसानीस तुम्हाला कां जबाबदार धरू नये? ‘ अशी मला बजावलेली ती ‘शो काॅज नोटीस’ च होती.
माझी भूमिका स्वच्छ होती. त्यामुळे ते पत्र वाचल्यानंतर उमटलेली माझी पहिली नकारात्मक प्रतिक्रिया क्षणकाळच टिकली. शांतपणे विचार केल्यानंतर एक गोष्ट मला स्पष्टपणे जाणवली. माझ्या अकोला ब्रॅंचमधील वास्तव्यादरम्यान नागपूरचे तेव्हाचे रिजनल मॅनेजर आणि मी या कर्जखात्यांच्या संदर्भात सतत संपर्कात असायचो. किंबहुना सेन्ट्रल आॅफिस आणि म्हणून झोनल आॅफिस या दोन्हीकडून माझ्या इतकाच त्यांच्यामागेही या गंभीर प्रकरणांबाबतचा ससेमिरा असायचाच. मी आणि ते दोघांच्या जवळजवळ एकाचवेळी प्रमोशन मिळून ट्रान्स्फर्स झालेल्या. आज ते तिथेच असते तर हा प्रश्नच निर्माण झाला नसता. पण आता तिथे आलेले नवीन रिजनल मॅनेजर आम्हा कुणालाच ओळखत नव्हते. त्यामुळे त्यांनी चुकीच्या पध्दतीने धसाला लावलेल्या या प्रश्नात ते मलाही गुंतवू पहात होते. त्यामागे त्यांचा नेमका काय उद्देश होता ते मला समजत नव्हतं. मी कितीही निर्दोष असलो तरी ते सिद्ध करून यातून बाहेर पडणं अवघड नसलं तरी मनस्ताप देणारं आणि वेळखाऊ ठरणारंही होतं. जे करायचं ते अतिशय विचारपूर्वक आणि शांतपणे करायला हवं आणि तेही ताबडतोब हे माझ्या लक्षात आलं!
स्वेच्छानिवृत्तीसाठीची ती आकर्षक योजना, सर्वांशी मोकळेपणाने चर्चा करून त्यासाठी अर्ज करायचा मी घेतलेला निर्णय, त्यामधे सेंट्रल आॅफिसच्या नुकतेच प्रमोशन मिळालेल्या आम्हा सर्वांच्या संदर्भातल्या धोरणामुळे निर्माण झालेली अनिश्चितता हे सगळे अडसर वखरेसाहेबांशी मोकळेपणाने चर्चा केल्यानंतर दूर झालेत असं वाटलं होतं पण तो असा एक चकवाच ठरला होता तर! दु:ख माझ्या स्वेच्छानिवृत्तीत आता पुन्हा अडसर निर्माण होणार याचं नव्हतंच. आपल्यावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध आपण कांहीही करू शकत नाही याचं दु:ख होतं!
आज जवळजवळ पंचवीस वर्षांनंतर या सगळ्याच घटनांकडे वळून पहाताना मला माझ्या बाबांचे शब्द आठवतात.
‘कर्ता करवता ‘तो’च. आपण फक्त निमित्तमात्र’ असं ते म्हणायचे. त्याचा नेमका अर्थ या सर्व घटनाच मला समजावून सांगू पहातायत असंच वाटू लागलं!
आज आलेलं हे पत्र वाचण्यापूर्वी फक्त तासभरच आधी मी माझ्या स्वेच्छानिवृत्तीच्या निर्णयाला वखरेसाहेबांची संमती घेऊन बाहेर पडलो होतो ते जग जिंकून आल्याच्या आनंदातच! वखरेसाहेबांना मी माझ्या या निर्णयामागची माझी भूमिका
मोकळेपणाने समजावून सांगितल्यानेच त्यांनी मनापासून आपल्याला पाठिंबा दिला असंच मला वाटलं होतं. इथं समोर हाकेच्या अंतरावर असणाऱ्या अपेक्षित अशा वळणावर वळायचं कीं आहे त्या सरळ रस्त्यानेच पुढे जात रहायचं याचा निर्णय घेणारा आता मीच आहे असंच मला वाटलं होतं! माझ्या मनात आलेल्या या ‘मी’ मधे कणभर कां होईना ‘अहं’ होताच! पण नंतर अगदी
अल्पकाळातच तो ‘अहं’ पूर्णतः नाहीसा झाला तो हे पत्र आल्यानंतर! आता मी करतो म्हणून कांहीही होणार नाहीय यांची स्पष्ट जाणीव मला झाली. मी निमित्तमात्र आहे आणि करता करवता ‘तो’च आहे हेच खरे! आता या क्षणी ‘तो’ बुध्दी देईल तसं करत जायचं आणि जे घडेल तेच ‘त्या’चा प्रसाद म्हणून स्वीकारायचं. तो अन्याय असो वा अन्यायाचं निराकरण. असं ठरवलं आणि मन शांत झालं. त्याचवेळी अचानक इंटरकाॅमवर वखरेसाहेब…!
“लिमये, तुमचा अॅप्लीकेशन फाॅरवर्ड करायला आत्ताच स्टाफ डिपार्टमेंटला पाठवलाय. आता लगेचच तुम्ही व्ही. आर. एस. घेताय ही बातमी आपल्या ऑफिसमधे षटकर्णी होईल बघा… ‘ असं म्हणून ते गंमतीने हसत होते. पण.. ते ऐकून मनाला स्पर्शू पहाणारा आनंद मात्र माझ्या हातातल्या ‘त्या’ पत्राकडे लक्ष जाताच मलूल होऊन गेला..!
या पत्राबद्दल वखरे साहेबांना आत्ताच कल्पना द्यायला हवी. माझा अॅप्लीकेशन फाॅरवर्ड होण्यापूर्वी त्यांना हे समजायलाच हवं.. ‘ मी भानावर आलो. झरकन् उठून बाहेर आलो. ‘ते’ पत्र हातात घेऊन वखरेसाहेबांच्या केबिनकडे धाव घेतली…! माझी पावलं या क्षणी प्रकाशवाटेकडे धाव घेतायत कीं मिट्ट काळोख्या अंधारवाटेकडे हे मात्र फक्त ‘त्या’लाच,… त्या कर्त्या-करवत्यालाच माहित होतं!!
माणसाचं मन जीवसृष्टीतल एक अजब रसायन आहे ते कधी कुणात एकजिनसी होऊन मिसळून एकरूप होऊन जाईल आणि कुणाशी बेइमानी करून कुणापासून कशासाठी फारकत घेऊन विभक्त होईल याचा काही नेम नाही. कारण ते चंचल अस्थिर, चपळ, चालाख आहे. याचा सर्वानी अनुभव घेतलेला असेलच. मना मुळेच मानवजातितील विवीधता, मतभिन्नता आवडीनिवडी, नितीमानता, आणि संतानी सांगितलेल्या शड्ररिपुंची देहावरची मजबूत पकड ठेवण्याच्या मनाच्या अफाट शक्तीचे धोरण सूक्ष्म निरीक्षणाने ध्यानात येते. मग माणूस आपल्यातला खरा माणूस शोधू लागतो. तो कोणाला किती सापडतो हे शोधणारालाच माहिती पडतं. पण ते सापडणं इतरांना सविस्तरपेणे सांगता येईल ही बाबही तशी अवघडच.
कारण जो तो मनाच्या या फाजील पणामुळेच आपल्याला राज समजून वागताना दिसतो राजासारखा पण जगतो चिंताग्रस्त माणसा सारखा. कारण त्याच मन त्याची कशी कधी फसगत करील हे त्यालाच माहीत नसतं. असलं हे लबाड, ढोंगी, आपमतलबी. निगरगटृठ, दिलदार, कपटी, रानटी, अडेलतट्टू, अशी बिरुदावली मिरवणार मन महा डांबीस असतं. ते ओढाळपणा करत माणसाला समाधनान निवांतपणे जगूच देत नाही. आणि स्वतःही मरत नाही. ते आपलं अधाशी बुभुक्षित स्वरूप एकवटून चिकाटीन जगतच रहातं. म्हणुनच माणसाला देवाने दिलेला शाप म्हणजे मनच आहे असं वाटू लागतं. तो शाप तहहयात सोसण्याशिवाय दुसरा पर्यायच नाही माणसा पुढं. याच्या कचाट्यातून सुटण्याची बुद्धी माणसाला फारफार उशीरा सुचते तेव्हा सुटण्याची वेळ निघून गेलेली असते. मग आपली हतबलता लपवत माणूस आपल्याला आल़ेला अनुभव आपलं तत्वज्ञान म्हणून दुसऱ्यांना आग्रहान सांगत बसतो. ते ऐकणाराही तेव्हा त्याचं आवर्तनातून जात असतो. हीच खरी तर गंमत आसते जगण्यातली
☆ उगवतीचे रंग – विळखा ऑनलाइन गेम्सचा… ☆ श्री विश्वास देशपांडे ☆
परवा एका मित्राच्या घरी गेलो. तो एकटाच होता. वहिनी दिसत नव्हत्या. त्याला म्हटलं, ” काय रे, वहिनी गावाला गेल्या आहेत का? ” तो म्हणाला, ” हो अरे, ती मयुरीकडे गेली आहे. आता तीन महिने तिकडेच राहणार. ” मयुरी म्हणजे माझ्या मित्राची मुलगी पुण्यात असते. आता तिचा मुलगा दहावीला आहे. मार्चमध्ये त्याची परीक्षा आहे. परंतु तो मुलगा अभ्यास करण्यापेक्षा मोबाईल जास्त पाहतो, सतत ऑनलाईन गेम्स खेळत असतो. मित्राच्या मुलीला आणि जावयाला असे वाटते की या सगळ्याचा परिणाम त्याच्या परीक्षेतील गुणवत्तेवर होऊ नये म्हणून त्यांनी त्याच्या आजीला दोन-तीन महिने बोलावून घेतले आहे. कारण ते दोघे नोकरी निमित्ताने बाहेर असतात. मग घरी त्याच्यावर लक्ष कोण ठेवणार? ते ऐकून मला खूप आश्चर्य वाटले. मुलांचे ऑनलाईन गेम्सच्या आहारी जाणे खरोखरच काळजी वाटावी इतके वाढले आहे.
अगदी लहान मुलांपासून तरुणांपर्यंत आणि काही मोठी माणसे सुद्धा या व्हिडिओ गेम्स आणि ऑनलाईन गेम्सच्या आहारी गेली आहेत. कुठेही गेले तरी प्रत्येकाच्या हातात मोबाईल दिसतो आणि कोणीतरी काहीतरी ऑनलाईन गेम किंवा व्हिडिओ गेम खेळताना दिसतो. सुरुवातीला करमणूक म्हणून काही वेळ त्यात घालवल्यानंतर त्याचे सवयीत कधी रुपांतर होते ते आपल्याला कळत नाही आणि मग त्याशिवाय जर राहवत नसले तर त्या सवयीचे रूपांतर व्यसनात झाले असे समजायला हरकत नाही.
हल्ली आई वडील आपल्या कामात खूप व्यस्त असतात. त्यामुळे मुलांसाठी त्याला वेळ देता येत नाही. अशावेळी विरंगुळा म्हणून किंवा करमणूक म्हणून ते त्याच्या हातात मोबाईल देतात आणि मग त्याला हळूहळू व्हिडिओ गेम्स किंवा ऑनलाईन गेम्सचे व्यसन लागते. २०२३ च्या आकडेवारीनुसार भारतात जवळपास सहा कोटी लोक ऑनलाईन गेम्स खेळतात. त्यातही लहान मुलांचे आणि तरुणांचे प्रमाण मोठे आहे.
हे आभासी जग एवढे आकर्षक आहे की त्यामुळे प्रत्यक्षातील आपल्यासमोर असलेल्या चांगल्या गोष्टींकडे आपले लक्ष जात नाही. या गेम्समधील ग्राफिक्स एवढे आकर्षक असतात की लहान मुलांबरोबरच मोठ्यांना देखील त्याचा मोह पडतो. एकदा खेळायला सुरुवात केली की पॉईंट्स वाढत जातात आणि त्याचे वेडच लागते. मग पुढील पायरी, त्याच्या पुढील पायरी असे करत करत मुले या अजगराच्या विळख्यात अडकत जातात. हा विळखा त्यांना इतका करकचून आवळतो की त्यातून बाहेर पडणे अशक्य होते. अशावेळी जर पालकांनी मुलांच्या हातातील मोबाईल काढून घेण्याचा प्रयत्न केला तर मुलं चिडचिड करतात, प्रसंगी हिंसक बनतात आणि कधी कधी तर त्याच्या पुढची म्हणजे आत्महत्येची पायरी गाठण्यापर्यंत त्यांची मजल जाते. या खेळांचे व्यसन लागल्यामुळे मुले एकलकोंडी बनतात. घरात असलेल्या आई-वडिलांशी देखील बोलण्याची त्यांची इच्छा होत नाही. ते आपल्याच आभासी जगात रमलेले असतात. ही एक प्रकारची नशाच असते. यालाच डिजिटल ड्रग्स असेही म्हटले जाते. हेडफोन लावून जगाच्या कानाकोपऱ्यातील लोकांशी बोलण्याची सोय पालकांशी बोलण्यापेक्षा त्यांना अधिक मजेशीर वाटते. कुटुंबातील सदस्यांपासून मुले अशा रीतीने लांब जातात.
काही ऑनलाईन गेम्स हे पेड असतात. अशावेळी मुले पालकांच्या ऑनलाइन कार्डाचे डिटेल्स वापरून हे गेम्स डाउनलोड करून घेतात. तसेच त्यात वेळोवेळी होणारी पैशाची मागणी देखील पुरवतात. हे गेम्स खेळत असताना बऱ्याच वेळा अनेक जाहिराती किंवा व्हिडिओ क्लिप्स पॉप अप होतात. अशा व्हिडिओ क्लिप मध्ये बऱ्याच वेळा संवेदनशील किंवा मुलांनी पाहू नये अशा प्रकारचा अडल्ट कंटेंट असतो. त्यामुळे मुलांच्या भावना नको त्या वयात उद्दीपित होतात, मुले भरकटतात आणि अभ्यासापासून दूर जातात.
या खेळामुळे मुलांचे आर्थिक आणि शारीरिक असे दोन्ही प्रकारचे नुकसान होत असते. मोबाईलकडे सतत टक लावून बघत राहिल्यामुळे डोळ्यांचे विकार होतात, सतत एकाच जागी बसून राहिल्यामुळे आणि शारीरिक हालचालीचा अभाव असल्यामुळे लठ्ठपणामध्ये वाढ होते आणि त्यामुळे आजारांचे प्रमाण वाढते. या ऑनलाईन गेम्स चा अतिवापर मानसिक आरोग्य बिघडवणारा सुद्धा ठरतो. चिडचिडेपणा, एकाग्रतेचा अभाव, अभ्यासातील रुची कमी होणे आणि हिंसक प्रवृत्ती वाढणे यासारखे दुष्परिणाम होतात. ऑनलाइन गेमिंगच्या माध्यमातून होणारी आर्थिक फसवणूक होण्याची दाट शक्यता असते तसेच संवेदनशील किंवा गोपनीय माहिती फसवणूक करणाऱ्यांच्या हाती लागल्यास ते त्याचा गैरवापर करण्याची शक्यता असते.
एक काळ असा होता की मुले ग्राउंडवर खेळण्यात रमून जात. निरनिराळे मैदानी खेळ खेळत. बऱ्याच वेळा पालकांना त्यांना ओढून आणावे लागत असे. पण आता मात्र ते व्हिडिओ गेम्स किंवा ऑनलाइन गेम्समध्ये एवढे अडकले आहेत की त्यातून त्यांना बाहेर काढणे आणि पुन्हा मैदानी खेळांकडे वळवणे कठीण झाले आहे.
याचा अर्थ मुलांनी ऑनलाईन गेम्स खेळूच नयेत असा नाही. पण त्यांना स्क्रीन टाईम ठरवून द्यावा. अनेक देशांमध्ये मुलांच्या मोबाईल वापरावर आणि इंटरनेटच्या वापरावर कठोर बंधने आहेत. अमेरिकेसारख्या देशात सहा ते बारा वयोगटातील मुलांना फक्त एक तास मोबाईलवरील गेम्स खेळण्याची तर सहा वर्षाखालील मुलांना फक्त अर्धा तास गेम्स खेळण्यासाठी परवानगी आहे.
या सगळ्यात पालकांची भूमिका अतिशय महत्त्वाची आहे. पालकांनी मुलांसाठी वेळ तर द्यायलाच हवा परंतु त्यांच्याशी मनमोकळा संवाद साधायला हवा. ऑनलाइन फसवणूक कशी होऊ शकते आणि त्यातील धोके कोणकोणते आहेत याची माहिती त्यांना द्यायला हवी. आणि यदाकदाचित त्यांच्याकडून एखादी चूक झाली तरी त्यांना न रागावता त्यातून बाहेर कसे काढता येईल यासाठी डोके शांत ठेवून मार्गदर्शन करायला हवे.
शक्य झाल्यास त्यांना स्वतः मैदानावर घेऊन जावे. मुलांच्या गर्दीने जर मैदानी गजबजली तर रुग्णालयातील गर्दी कमी होईल हे लक्षात ठेवावे आणि त्यांना पटवून द्यावे. मैदानावरील खेळामुळे मुलांची शारीरिक आणि मानसिक निकोप वाढ होते, त्यांची शक्ती वाढते, एकाग्रता वाढते, नेतृत्व गुणांचा विकास होतो हे त्यांच्या मनावर बिंबवले पाहिजे. एकदा मुलांना त्याची आवड लागली की मग मुले स्वतःहूनच मैदानावर खेळायला पसंती देतील.
मुलांचा मोबाईल एकदम काढून घेण्यापेक्षा टप्प्याटप्प्याने त्यांना त्याच्याशिवाय राहण्याची सवय लावा. त्याने तुमचे ऐकल्यानंतर त्याला छोटेसे बक्षीस द्या किंवा त्याचे कौतुक करा. जेवणाच्या टेबलावर किंवा अभ्यासाच्या खोलीत मोबाईल घेऊन जाऊ देऊ नका. त्याचप्रमाणे मुलांना गाणी म्हणणे, चित्रे काढणे, वाचन करणे, बागकाम करणे यासारख्या गोष्टींची आवड लावता येईल. पण त्यासाठी पालकांना देखील स्वतःचे काम किंवा मोबाईल बाजूला ठेवून मुलांसाठी वेळ द्यावा लागेल. तरच भावी पिढीचे भविष्य उज्ज्वल होईल.
जन्मभूमी निवडण्याचे स्वातंत्र्य आपल्याला नसते. तरीही प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर आपली कर्मभूमी आपण निवडू शकतो आणि आपल्या कर्माचा ठसा तिथे उमटवूं शकतो. याचे उत्तम उदाहरण म्हणजेच सावित्रीबाई खानोलकर.
सावित्रीबाई म्हणजे एखाद्या मराठमोळ्या स्त्रीचे नाव वाटते. पण त्यांचे मूळचे नाव ‘इव्हा युओन लिंडा’. असे होते. जन्म २० जुलै १९१३ रोजी स्वित्झर्लंड मध्ये झाला. आई रशियन व वडील हंगेरीचे होते. आई लहानपणीच वारली. वडील समाजशास्त्राचे प्राध्यापक तसेच ग्रंथपालही होते. त्यामुळे इव्हाना लहानपणापासून विविध प्रकारची पुस्तके वाचायला मिळाली. त्यातून भारत व भारताचा इतिहास कळला. भारताविषयी ओढ निर्माण झाली.
मेजर विक्रम खानोलकर हे भारतीय लष्कर अधिकारी मुळचे महाराष्ट्रातील सावंतवाडीचे रहिवासी होते. रॉयल मिलिटरी अकॅडमी, सॅंडहस्ट येथे त्यांचे शिक्षण झाले. तेव्हा ते स्विझर्लंडला गेले असताना त्यांची व इव्हा यांची भेट झाली. १६ वर्षाची इव्हा २७ वर्षांच्या भारतीय तरुणांच्या प्रेमात पडली. आई-वडिलांचा विरोध पत्करून १९३२साली, आपल्या निर्णयावर ठाम असलेली ही मुलगी, भारतात आली. त्यावेळी त्या अठरा वर्षाच्या होत्या. २९ वर्षांच्या मेजर विक्रम यांचे बरोबर त्यांनी लग्न केले. हिंदू धर्म स्वीकारला. इव्हाच्या सावित्रीबाई खानोलकर झाल्या.
त्या पूर्णपणे बदलल्या. भारतीय संस्कृतीचा त्यांनी पूर्णपणे अंगिकार केला. साडी, कुंकू, साध्या चपला, शाकाहारी जेवण यांचा स्वीकार केला. भारतीय भाषा, वेद, उपनिषदे, संस्कृत काव्य यांचा अभ्यास सुरू केला. पाटणा विद्यापीठात प्रवेश घेतला व पदवी मिळवली. रामकृष्ण मिशनचा भाग बनल्या. चित्रकला, संगीत व नृत्याची आवड होती. त्यात प्राविण्य मिळवण्यासाठी उस्ताद पंडित उदयशंकर यांची शिष्या झाल्या. हे सर्व करून ‘सेंटस् ऑफ महाराष्ट्र’ आणि ‘संस्कृत डिक्शनरी ऑफ नेम्स’ ही पुस्तके त्यांनी लिहिली. ती खूप गाजली. हिंदी, मराठी, संस्कृत बोलू शकत. भारतीय संस्कृती आणि परंपरा यात त्या समरसून गेल्या.
देशाला स्वातंत्र्य मिळाले आणि लगेचच भारत पाकिस्तान युद्ध सुरू झाले. देशाच्या शुरानी बलिदान केलं. तेव्हा युद्धात प्राण्याची आहुती देणाऱ्या वीरांच्या सन्मानार्थ नवीन पदकांची रचना करण्याचे काम मेजर जनरल हिरालाल अटल यांच्याकडे आले. त्यासाठी त्यांनी सावित्रीबाईंची निवड केली. सावित्रीबाईंनी हे आव्हान स्वीकारले. भारतीय संस्कृती आणि वेद पुराणांच्या अभ्यासाचा उपयोग केला. काही दिवसांच्या अथक प्रयत्नानंतर पदकांची रचना मे. ज. अटल यांच्याकडे त्यांनी पाठवली. सर्वाना ती पसंत पडली. हे बनवत असताना इंद्राचे शस्त्र वज्राची प्रेरणा मिळाली. महर्षी दधिचीनी वृत्रासुराला मारण्यासाठी लागणारे अमोघ शस्त्र (वज्र) बनविता यावे म्हणून त्यांचे शरीर त्यागले होते. त्यांच्या अस्थी पासून बनवलेले वज्र हे समर्पणाचे प्रतीक. म्हणून परमवीर चक्राच्या मध्यभागी भारताची राजमुद्रा आणि त्या भोवती इंद्राच्या वज्राची चार चिन्हे कोरलेली आहेत. हे गोलाकार चिन्ह ३. ५ सेंटीमीटर व्यासाचे कास्य धातूचे आहे. दुसऱ्या बाजूला हिंदी व इंग्रजी मध्ये परमवीर चक्र असे कोरले आहे. या दोन शब्दांच्या मध्ये कमळ आहे. सैनिकाची शक्ती आणि बलिदान राष्ट्राचे रक्षण कसे करेल याचं ते चिन्ह म्हणजे प्रतीक. त्याग आणि शक्तीचे हे प्रतीक, यातून युगानुयुगे चालत आलेल्या संस्कृतीचा धागा मजबूत केला.
पहिलं परमवीर चक्र पाकिस्तान युद्धात शहीद झालेल्या मेजर सोमनाथ शर्मा यांना देऊन सन्मानित करण्यात आले. हे मेजर शर्मा सावित्रीबाई खानोलकर यांची कन्या कुमुदिनी हिचे दिर होते. परमवीर चक्रा प्रमाणेच अशोकचक्र, महावीरचक्र, कीर्तीचक्र, वीरचक्र, शौर्यचक्र अशा प्रमुख चक्रांची रचना सावित्रीबाईंनी केली. ही देशाला त्यांनी दिलेली देणगी. त्यामुळे भारताच्या इतिहासात त्यांचे नाव सुवर्ण अक्षराने लिहिले जाईल.
१९२९ मध्ये किंग्स कमिशन मध्ये जॉईन झालेल्या खानवीलकरानी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पदावर काम केले. पाच ऑगस्ट १९४९ रोजी दिल्ली क्षेत्राचे जी ओ सी नंतर १९५२ मध्ये कलकत्ता पायदळ तुकडीचे नेतृत्व त्यांनी स्वीकारले. ते कठोर, शिस्तप्रिय प्रशासक म्हणून ओळखले जात. पत्नीसह ट्रेन ने कलकत्त्याला परतत असताना २९ ऑगस्ट १९९२ रोजी सकाळी हृदयविकाराने त्यांचे निधन झाले. त्यांच्या मरणोत्तर मेजर जनरल पदावर त्यांना बढती देण्यात आली. त्याना दोन मुली व एक मुलगा होता.
विक्रम खानवीलकरांच्या मृत्यू नंतर सावित्रीबाईंनी पूर्णपणे अध्यात्माला समर्पित केले. हुतात्मा झालेल्या सैनिकांच्या कुटुंबासाठी आणि निर्वासितांसाठी त्यांनी भरपूर काम केले. १९९० मध्ये त्यांचे निधन झाले. अशी ही निसर्गाची आवड असणारी, स्वित्झर्लंडची कन्या पूर्ण भारतीय होऊन राहिली. आपल्या कार्याने अजरामर झाली.
☆ वस्तू वस्तू जपून ठेव – ३ – कंदील – ☆ सुश्री विभावरी कुलकर्णी ☆
परवा रस्त्याने जाताना एक सुंदर सजावट दिसली. बाहेर ओळीने कंदील लावलेले होते. ते बघून मी एकदम बालपणात पोहोचले. माझे बालपण ज्या ठिकाणी गेले त्या गावात वीज नव्हती. त्यामुळे हे कंदीलच सर्वत्र उजेड करायचे. अगदी रस्त्याने जाताना सुद्धा रस्ता दिसण्यासाठी हातात कंदील असायचा. कारण बंदिस्त काच असल्याने त्याला वाऱ्यापासून संरक्षण मिळायचे. आणि उजेड पडायचा. घरात तर प्रत्येक खोलीत असा कंदील असायचा. आणि तो भिंतीवर खुंटीला अडकवला की सगळ्या घरात उजेड पडायचा. ज्याला अंगणात जायचे असेल त्याने तो वरच्या कडीला धरून आपल्या सोबत घेऊन जायचा. आणि आपल्या पुरता अंधार गायब व्हायचा. मला तर खूप मज्जा वाटायची. तो उजेडाचा गोल आपल्या बरोबर प्रवास करायचा. आणि लांबून येणाऱ्याला माणूस दिसायचाच नाही. फक्त उजेड आपल्या दिशेने येताना दिसायचा.
हा कंदील घेताना घरातून बजावून सांगितले जायचे, “प्रभाकर कंदीलच घ्या”. काच नीट बघून घ्या. काच ओगले यांची असेल तोच घ्या. त्यातही दोन, तीन रंग मिळायचे. हा कंदील मिळायचे पुण्यात दत्ताच्या देवळा जवळ दुकान होते. तेथूनच आणा असेही सांगितले जायचे. घरात कंदील आला की मोठेच कौतुक वाटायचे. त्याला हळदी कुंकू लावले जायचे आणि सुरक्षित ठिकाणी ठेवले जायचे. दुपार नंतर तो कंदील घेऊन त्यात चपटी वात घातली जायची. आणि रॉकेल भरायचे. त्याच्या काचेच्या खालची किल्ली वर खाली करुन ती वात रॉकेल मध्ये भिजली आहे का बघितले जायचे. मग त्यावर काच चढवली जायची.
आणि कडेचा स्टॅन्ड (आम्ही त्याला घोडा म्हणत होतो) वर खाली करुन मगच ही कंदील उजळण्याची प्रक्रिया पूर्ण व्हायची.
दुसऱ्या दिवसा पासून संध्याकाळी कंदीलची काच साफ करणे हे जोखमीचे पण आवडते काम रोज करावे लागे. आणि ती काच चमकवण्या साठी आमच्या लहान मुलांची स्पर्धा लागायची. त्या साठी विविध प्रयोग चालायचे. नुसत्या मऊ कपड्याने काच पुसणे. चुलीतली राख चाळून त्याने काच घासणे. मऊ कापडाने पुसणे. पाणी व साबण याने साफ करणे. पण त्यात हातातून निसटून पडून फुटण्याचा धोका असे. अशा काचा चकचकित केल्या की आम्ही शेजारी ठेवून कोणाची काच जास्त स्वच्छ झाली याचे निरीक्षण करत असू. विशेष म्हणजे तो उजळलेला कंदील चुकून पडला तरी आग लागत नसे.
याच्या उजेडात घरातली कामे व्हायचीच पण आमचे भविष्य पण उजळत होते. हा कंदील मध्ये ठेवून त्याच्या भोवती मी व माझ्या मैत्रिणी अभ्यास करत होतो. कारण दिवसभर शाळा आणि रात्री अभ्यास करावा लागायचा.
त्या कंदीलाचा वरचा भाग गरम व्हायचा. आणि त्याच्या उष्णतेने माझे माथ्यावरचे केस कायम जळायचे. पण बुद्धी मात्र उजळायची आणि अभ्यासाचा उजेड डोक्यात पडायचा.
मी असा कंदील खूप वर्षे जपून ठेवला होता. आणि लाईट गेल्यावर मेणबत्ती ऐवजी त्याचा वापर करत होते. तो बघून शेजाऱ्यांना खूप आश्चर्य वाटायचे. आणि मुलाला आकर्षण वाटायचे.
नंतर सगळीकडे विजेचे खांब उभे राहिले. घरात बल्बचा उजेड पडला आणि अत्यावश्यक कंदील माळ्यावर रवाना झाला. पण त्याच्या आठवणी मात्र अजून मनात आहेत.
☆ स्त्री कालची आणि आजची… ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆
रामायण आणि महाभारत ही आपली महाकाव्ये. या दोन पौराणिक कथानकातून स्त्री ची विविध रूपे समोर आली. अहिल्या, द्रौपदी, सीता, तारा, मंदोदरी या
लेखक स्त्रिया महान पतिव्रता म्हणून जनमानसात रूजल्या गेल्या. यांचे केवळ स्मरण केल्याने महापातकांचा नाश होतो असे संस्कार या काळात केले गेले.
संत वाङमय, पंत वाड़मय आणि शाहिरी फड यातून वर्णिलेली स्त्री लोकसाहित्याचा विशेष भाग ठरली. जनमानसात खोलवर रूजलेली ही स्त्री, समस्त नारीशक्ती समाजाशी संवाद साधत गेली. माया, ममता आणि करूणा या भावनांच्या मुशीतून घडलेली ही स्त्री त्याग, समर्पण आणि विश्वास या त्रिसूत्रीतून स्वतःला, कुटुंबाला, समाजाला घडवीत गेली.
पौराणिक काळातील स्त्री पातिव्रत्य, हे अस्त्र समजून स्वसंरक्षण करीत गेली. सत्यवती, माद्री, कुंती गांधारी, सुनिती, सुरूची, आदिती, छाया, अनुसया, लक्ष्मी, सरस्वती, पार्वती, यशोदा, देवकी, रूक्मिणी सुभद्रा या, सर्व स्त्रियांनी उत्पत्ती, स्थितीआणि लय यांचा समतोल राखण्यासाठी वेळीवेळी सत्व परीक्षा दिली. पुरुष प्रधान संस्कृती चा संघर्ष त्या काळापासून आज तागायत ही स्त्री करीत आहे.
कालची स्त्री जेव्हा जेव्हा बंड पुकारून जागृत झाली तेव्हा तेव्हा ती समाजासाठी आदर्श ठरली. पण हे आदर्श पण टिकवायला तिला स्वतःला अतोनात कष्ट सहन करावे लागले. संत मीराबाई, संत जनाबाई, संत सखू, संत कान्होपात्रा, संत मुक्ताबाई यांचा जीवन प्रवास अत्यंत कष्टमय होता. यांच्या शब्द सुमनांची वैजयंती माळा विठ्ठलाच्या गळ्यात पडली पण त्यासाठी समाजकंटकाची वासनांध नजर, कर्मठ रूढी परंपरांची तीक्ष्ण धारधार सुई काळजात आरपार टोचून घ्यावी लागली.
ऐतिहासिक कालखंडात स्त्री ने पौराणिक काळातील शस्त्र विद्येचा अभ्यास करून न्यायासाठी, संघर्षासाठी रणांगणात उतरली. छत्रपती शिवाजी महाराज यांची जन्मदात्री एकमेव ठरली. यानंतर अशी स्त्री जन्मली नाही असे खेदाने म्हणावे लागेल. कारण आजतागायत प्रति शिवाजी जन्माला आलेला नाही. शिवाजी महाराजांनंतर शिवशाहीतील दोन स्त्रीयांनी वर्षानुवर्षे तुरूंग वास भोगला. महाराणी येसूबाई, आणि ताराबाई या दोन स्त्रिया होत. एकीने स्वराज्यासाठी यवनी कैद स्विकारली तर ताराबाई सवती सुभ्यामुळे स्वराज्यातच कैदेत होत्या. महाराणी जोधाबाई, झाशीची राणी, राणी चन्नमा, चांदबिबी, मुमताज, रमाबाई, आनंदी बाई या स्त्रिया शेवटपर्यंत लढा देत गेल्या.
या सर्व इतिहासाचा मागोवा घेत सावित्री, रमाई, अहिल्याबाई, आनंदी जोशी, रमाबाई रानडे या स्त्रिया स्वतः साक्षर झाल्या. मुलगी शिकली प्रगती झाली हे ब्रीदवाक्य इतिहासात कोरले गेले ते यांनी केलेल्या समाज कायामुळे. आज प्रत्येक क्षेत्रात महिला अत्यंत विश्वासाने मोठ मोठ्या पदांवर कार्यरत आहेत. कला, उद्यम आणि संस्कृती या क्षेत्रात महिला आघाडीवर आहेत. पण चार भिंतीच्या आत आजची स्त्री अजूनही असुरक्षित आहे. कौटुंबिक हिंसाचाराला बळी पडणार्या स्त्रिया त्यांच्या वेदना आजही कुठेतरी धुमसत आहेत.
कालची स्त्री आणि आजची स्त्री रूपे आणि स्वरूप बदलले आहे. पण त्याग, समर्पण, अवहेलना स्री ला आजही चुकलेली नाही. आजची स्त्री समाजात अर्थार्जनासाठी बाहेर पडताना आजही सर्व कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडून पुरूषी अहंकाराचा सामना करीत कुटुंबाला सावरीत आहे. सत्ता, पैसा आणि वासना यांचा उपभोग घेण्यासाठी आजही स्त्री वापरली जाते, विकली जाते, रूढी परंपरांच्या नावाखाली नागवली जाते.
विभक्त कुटुंबाची वाढत जाणारी संख्या सासू सून संघर्ष, माहेरचे अती लाड, इगो प्राॅब्लेम, पैशाची गुर्मी यात अजूनही स्त्री प्रमुख पात्र म्हणून खेळवली जाते.
अनाथ आश्रम, वृद्धाश्रम, पाळणाघर या समस्येला सामोरे जाणारी स्त्री समाजाकडून आजही दोषी ठरवली जाते. माता, भगिनी, पत्नी, सखी या रूपात समोर येणारी स्री आजही पुरूषी अत्याचाराला बळी पडत आहेत.
काळ बदललाय, माणूस बदललाय, जमाना बदललाय. . .असः नेहमी ऐकतो आपण. कोणी घडवले हे बदल? माणसानच आपली विचारसरणी बदलली आणि दोष बदलत्या काळाला आणि स्त्री ला पुरूष वर्ग परस्पर देऊन मोकळा झाला. आपण समाजात रहातो. . . समाजाचे देणे लागतो. . . ही संकल्पना प्रत्येकाने सोइस्कर अर्थ लावून बदलून घेतली. स्वतःची जीवनसंहिता ठरवताना प्रत्येकाने माणसापेक्षा पैशाला अधिक महत्त्व दिले अन तिथेच नात्यात परकेपणा आला.
चार पायाच्या प्राण्यांना
हौसेने पाळतात माणसं
दोन पायाच्या आप्तांना
मोलानं सांभाळतात माणसं .
हे आजचं वास्तव आहे. विभक्त कुटुंब पद्धतीतून जन्माला आलेली ही विचार सरणी. आज ”हम दो हमारा एक” चा नारा लावणारे सुशिक्षित पाळीव, मुक्या प्राण्यांवर अतोनात भूतदया दाखवतात. अन जन्मदात्या आईवडिलांना मात्र वृद्धाश्रमाचा रस्ता दाखवतात. मी मी म्हणणारे सुशिक्षित पतीपत्नी दिवसरात्र घराबाहेर रहातात. नवी पिढी सोशल मिडिया नेटवर्किंग मधून स्वतःचे भविष्य साकारताना दिसते. एकविसाव्या शतकातील घर संवाद साधताना कमी पण वाद घालताना जास्त दिसतात. वाद वाढले की माणस माणसांना टाळायला लागतात. अशी नात्यातली अंतरेच नात्यात विसंवाद आणि दरी निर्माण करतात.
नवीन पिढीला आता संस्कारापेक्षा व्यवहार जास्त महत्वाचा वाटतो. पैसा असेल तर माणूस ताठ मानेने जगू शकतो हा अनुभव त्याला आपल्या माणसात दुरावा निर्माण करायला भाग पाडतो. जुन्या पिढीतील नातवंडे सांभाळणारी जुनी पिढी, त्यांचे विचार, नव्या पिढीला नकोसे वाटतात. ”पैसा फेको तमाशा देखो ” हे ब्रीद वाक्य घेऊन नवीन पिढी माणुसकी पेक्षा मतलबी पणाला प्राधान्य देताना दिसते.
वृद्धापकाळी हवा असलेला मायेचा ओलावा, समदुःखी, समवयस्क व्यक्ती कडून मिळाल्यावर एकटा जीव वृद्धाश्रमात आपोआप रुळतो. स्वतःच दुःख विसरायला शिकतो. प्रत्येक व्यक्ती आपला राग आपल्या व्यक्ती वर किंवा पगारी नोकरावर काढू शकते. .वृद्धाश्रमात या दोन्ही गोष्टी शक्य नसल्याने माणूस नव्याने जगायला शिकतो. स्वतःच्या विश्वात रममाण होण्यासाठी स्वतःच्या भावनांना आवर घालतो आणि हा नवा घरोबा स्विकारतो.
नवीन पिढीला घडविण्यात आजची स्त्री कुठेतरी कमी पडत आहे का? याचा विचार करण्याची गरज आता निर्माण झाली आहे.
आपण कुणाचा आदर्श घ्यायचा? कुणाचा आदर्श समोर ठेवायचा? आपली जबाबदारी, आपली कर्तव्ये हे सारे जर आपण आपल्या आर्थिक परिस्थितीशी निगडीत केले तर हा गुंता सोडवायला अतिशय कठीण जाईल.
आपण आणि आपली जबाबदारी यात जोपर्यंत ”आई बाबा ‘, यांचा समावेश होत नाही तोपर्यंत ही पळवाट आडवाटेन या समाजव्यवस्थेला, कुटुंब व्यवस्थाला दुर्बल करीत रहाणार यात शंका नाही.
मी माणसाचा आहे, घरातील बाई माणूस माझ्या कुटुंबाचा घटक आहे त्याच मन जपणे ही माझी जबाबदारी आद्यर्तव्य आहे हे जोपर्यंत पुरुष प्रधान संस्कृती मान्य करीत नाही तोपर्यंत ही पळवाट अशीच निघत रहाणार. आपण घडायचं की आपण बिघडायचं स्री ला आधार द्यायचा की भार व्हायचं हे आता ज्याचं त्यानचं ठरवायचं.
कालची स्त्री आणि आजची स्त्री हा विचार करताना मन मात्र खालील काव्यपंक्तीवर स्थिर होते.
थोर महात्मे होऊन गेले, चरीत्र त्यांचे पहा जरा
आपण त्यांच्या समान व्हावे हाची सापडे बोध खरा
या नररत्नांना जन्मणारी ही माऊली आज समाजात सुरक्षित आहे का? हा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
या देशाच्या सर्वोच्च पदी राष्ट्रपती पदावर राहण्याचा मान एका स्त्री ला मिळूनही आजची स्त्री उपभोग्य वस्तू समजली जाते हे आपले दुर्दैव आहे. विश्वबंधुतेचा आणि समानतेच्या नारा देऊन आपण ही नारीशक्ती आद्य ईश्वराचे रूप मानून स्त्रीला संघटीत आणि सुरक्षित करण्याची जबाबदारी आपल्यावर आली आहे. तरच आपण अभिमानाने म्हणू शकू.
☆ “स्वयंपाक घर आणि आंतरराष्ट्रीय घडामोडी…” ☆ श्री कौस्तुभ परांजपे ☆
स्वयंपाक घरात होणारी चर्चा काहि ठराविक मुद्यांवरच होते. त्या मुद्यांचा जागतिक मुद्यांशी तसा संबंध नसतो. तसा असायचं कारणही नाही. कारण आज भाजी कोणती करु?… या प्रश्नाशी जागतिक बाजारातपेेठेेत मिळणार्या भाज्या कोणत्या. त्या पालेभाज्या आहेत का फळभाज्या. त्या करायच्या कशा… म्हणजे. तेलावर का शिजवून. पातळ भाजी का दाण्याचा कुट लावायचा. किंवा त्यांचे असलेले बाजारभाव याचा आपल्याशी काहीही संबंध नाही. अगदी खोबरं किंवा मिर्ची याचा ऊल्लेख आला तरी खोबर्याच्या बाबतीत राजापुरी खोबरं आणि मिर्ची बाबत सिमला मिर्ची अथवा लवंगी मिर्ची या पनवेेल किंवा सिमल्याची. नाहीतर कोल्हापुरची सीमा ओलांडून पलिकडे आम्ही गेलो नाही.
फारतर दिवाळी जवळ आली की फराळाचे पदार्थ करायचे का… कोणते… का विकत आणायचे… यावर चर्चा होते. किंवा थांबते. तिथे काही दिवाळीत विकत घ्यायच्या फटाक्यांचे प्रकार किंवा बाण आणि संरक्षण क्षेत्राकडे असणारे अग्निबाण. किंवा फटाक्यातले बाॅम्ब आणि सैन्याकडे असणारे बाॅम्ब यांंचा या र्चेचत संबंध नसतो.
अधुुनमधूून कामवाली येणार नाही. किंवा पाणी येणार नाही याचवेळी थोडी आणिबाणी जाणवायची. पण ती सुध्दा घरगुती. त्याचा जागतिक घडामोडींशी किंवा निर्माण झालेल्या आणिबाणी सद्रुष्य परिस्थितीशी संबंध नसायचा. त्यामुळे स्वयंपाक घरात जागतिक चर्चा होतच नव्हती. थोडक्यात स्वयंपाकघर आणि जागतिक घडामोडी यांच्या सीमा सुरक्षित ठेवल्या होत्या. कोणत्याही प्रकारे सिमोल्लंघन किंवा घुसखोरी नव्हती.
दोन देशात काही बाबतीत शीतयुद्ध असत. पण आमची चर्चा शितकपाट म्हणजेच फ्रिज यात काय भरलंय याच विषयावर फ्रिज व्हायची. त्यामुळे तिथेही असणारा आंतरराष्ट्रीय प्रभाव तसा थंडच होता. पण आता मात्र त्या चर्चा बदलल्या होत्या.
रशिया. युक्रेन. इस्रायल. चिन. अमेरिका आणि विशेषकरून डोनाल्ड ट्रंप यांचा विषय येतोच. म्हणजे भंंगार किंंवा रद्दी घेणारा. भाजीवाला जस सहजपणे दोनचार वेळा दारावरून ओरडत जातो. तितक्याच सहजपणे यांचा विषय होतो. कारण काय तर या सगळ्यांमुळे वाढत जाणारे सोन्या चांदिचे भाव. हमास या शब्दाचा वापर तर हमाम साबण जितक्या सहजतेने आणि सारखा सारखा वापरतो तेवढ्या सहजतेने वापरला जात होता.
आता टमाटा आणि डोनाल्ड ट्रंप यांचा काहीच संबंध नाही. तरीही डोनाल्ड ची धोरणंतर टमाट्याच्या भावासारखी रोज बदलतात असा सूर लावत त्याच्या धोरणांना आम्ही सहज टमाट्याच्या बरोबर तोंडीलावायला घेतो. डोनाल्ड या नावाचाच राग आहे.
मी मोबाईल वर ॲलन डोनाल्ड या क्रिकेट खेळाडूची एक ध्वनीचित्रफित बघत होतो. त्याच्या आवाजाने घरात विचारलं. काय पाहताय येवढं. मी सहज म्हंटल. ङोनाल्डचा व्हिडीओ आहे छोटासा. छान आहे.
झालं… डोनाल्डचा व्हिडीओ. आणि चांगला. यावरच आवाज इतका वाढला कि कदाचित ॲलन किंवा ट्रंप पैकी कोणताही डोनाल्ड जवळ असता. किंवा दोघेही असते तर ते सुध्दा थोडावेळ गप्प बसले असते…
काय म्हणतोय तो आता.. आता काय वाढवतोय… मग मला सांगाव लागलं कि हा वेगळा डोनाल्ड आहे. हा फास्ट बॉलर होता… तरीही डोनाल्ड या नावाचा राग काही गेला नव्हता…
असेल फास्ट बॉलर… याची धोरणं डोक्यावरुन जातात. त्याचे बाॅल जात असतील. पण सगळं डोक्यावरुनच जात नं… त्याचा बॉल डोक्याला लागू नये म्हणून निदान हेल्मेट तरी वापरता येतं. याच्या डोक्यावरुन जाणाऱ्या गोष्टींसाठी काय वापरणार… डोक्यावरुन जाणारा चेंडू कसा टाकायचा. यासाठी तरी तो तुुमचा डोनाल्ड डोकं वापरत असेल. पण या डोनाल्डच्या डोक्याच काय… आता या युक्तीवादावर मी काय बोलणार… मी आपलं अंपायर्स काॅल सारखा निर्णय मान्य केला.
हा राग काहि येवढ्यावरच थांबला नाही. पुढे सुरुच होतं.
याचा राग कशावर. तर आम्ही दुसरीकडून घेत असलेल्या तेलावर. अरे तुला काय त्याच्याशी. तुला विकायच तर आम्हाला परवडेल त्या किमतीला विक… आम्ही पाच किलो तेल घ्यायला बाजारात गेलो तरी दोन ठिकाणी तेलाचे भाव पाहतो… तुला जमत असेल तर दे. नाहीतर जा तेल लावत… हे याचं म्हणजे वडाच तेल वांग्यावर काढण्यासारख आहे. यावर तेलाचा आंतरराष्ट्रीय विचार थांबतो. नाहीतर हे तेल प्रकरण इतक गरम झालं असत कि भक्त प्रल्हाद सारखं यालाही गरम तेलात टाकण्याची शिक्षा दिली असती.
हा संताप किंवा राग थांबला अस वाटत होत. तेवढ्यात एक मित्र सपत्नीक आला. त्याचा दात दुखत असल्याने संध्याकाळी तो दाताच्या डाॅक्टरांकडे जाऊन आला होता.
तो म्हणाला. डाॅक्टरांनी त्याचे सहज दिसणारे दात त्यांच्या भिंगाच्या सहाय्याने पाहिले. दोनचार प्रश्न विचारले आणि म्हणाले. फार काहि नाही. थोडी मोकळी जागा आहे तिथे फक्त थोडी चांदी भरावी लागेल. इतकच. झालं… त्यावरून परत चर्चा सुरु झाली…
काय भाव वाढत चाललेत चांदिचे. यांना काय लागत फक्त थोडी चांदी भरा म्हणून सांगायला. अगोदर ब्लड रिपोर्ट करणारे यांच्या संबंधातले असतात अस म्हणत होतो. आतातर चांदिवालेपण मिळालेले वाटतात. आणि जी चांदी वरुन दिसणारच नाही ती भरुन करायचं काय.. चाटायची आहे… चाटायची म्हंटली तरी दाताच्या खालीच असणार… कशी पुरणार जिभ…
माझ्या पायातली साखळी किंवा अंगठी केली तर दिसेल किंवा दाखवता येईल. पण दातातल्या चांदिच काय करणार… ते काही हत्तीचे दात आहेत दिसायला.
असं म्हणत मित्राची बायको माझ्या बायकोबरोबर स्वयंपाक घरात गेली… आणि परत स्वयंपाक घरातल्या चर्चेत आंतरराष्ट्रीय घडामोडींचा संदर्भ आला…