मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “समिधाच सख्या या!!” — रत्नावली – लेख क्र. ५ ☆ प्रा.भारती जोगी ☆

प्रा.भारती जोगी

? इंद्रधनुष्य ?

☆ “समिधाच सख्या या!!” — रत्नावली – लेख क्र. ५. ☆ प्रा.भारती जोगी ☆

(चित्र पुढील माहितीनुसार काल्पनिक.)

निसर्गाने रौद्र रूप धारण केलेले… भयंकर पाऊस सुरू… कालिंदी नदीला महापूर आलेला… आणि अशा या प्रतिकूल परिस्थितीत अर्ध्या रात्री एक तरूण पती माहेरी गेलेल्या पत्नीच्या आठवणीत विरहदग्ध, मिलनातूर, विकल मनाने वेड्यासारखा थेट पोचतो पत्नीच्या माहेरी, तिच्या पुढ्यात… सामोरा!! नदी पार करतांना काष्ट समजून एका मानवी शवाचा आधार घेत, भिंतीवर चढण्यासाठी दोर समजून सापाला धरून… बेभान अवस्थेत!! 

पत्नी चकीत होते… पण दुसऱ्याच क्षणी सत्य कळल्यावर, तिला आपल्या रूप आणि यौवनाचा धिक्कार करावासा वाटला. आणि तिच्या तोंडून उद्विग्न उद्गार बाहेर पडले…

लाज न लागत आपको, दौरे आहे साथ, 

धिक धिक ऐसे प्रेम को, कहा कहौ मैं नाथ !! 

आणि असा धिक्कार करत तिनं पुढे त्याला ही उन्मादावस्थेतून जागं केलं…

अस्थि चर्ममय देह, यांमे ऐसी प्रीती

जो होती रघुनाथ मंह, होती न तो भवभीती!! 

आपल्या पतीला हे असे खडे बोल सुनावणारी ही सुंदर रूप यौवना, युवती होती… रत्नावली!!! 

आणि तो युवक, तिचा पती होता… तुलसीदास उर्फ रामबोला!!! 

रत्नावली… सौंदर्य आणि बुद्धी दोन्हीं लेऊन आलेली एक धर्मपरायण युवती ! जी लावण्यम् अंतर्मन: ही होती. म्हणूनच तिने दाखवून दिले की, भारत देशातील नारी; तिने ठरवलं तर आपल्या पतीला युवावस्थेच्या उन्माद क्षणांमधून ईश्वर भक्तीकडे उन्मुख करण्यास सक्षम असते.

रत्नावली चे हे शब्द तुलसीदास ने ऐकले आणि त्याच्या मनावरील उन्माद, मोह, भ्रांती या सगळ्याचा पडदा दूर झाला. पूर्वजन्मीचे संस्कार प्रदिप्त झाले. आणि आता डोळ्यांसमोर श्रीरामाचे मंगलकारी शुभ रूप, संपूर्ण सौंदर्यासहीत दृग्गोचर झाले. आणि तो निघाला विरक्ती च्या वाटेवर, संन्यस्त वृत्ती ने, प्रभु रामचंद्र च्या कृपादृष्टी च्या लाभासाठी! 

रत्नावली जिने दाखवून दिलं की, प्रेम जेव्हा ईश्वरा प्रती नेणारे असते तेव्हा ते एक गहन परिवर्तन, एक उच्चतम आव्हान स्वीकारायला तयार असते. आणि म्हणूनच समर्पित जीवन स्वीकारायला ही तयार असते.

रत्नावली ने एक चैतन्य तुलसीदास च्या मनात चेतविले. त्याच्या चेतनेला जागवलं… आणि तुलसीदास ला ही… या… समिधेच्या शब्दस्पर्शातलं स्फुल्लिंग जाणवलं! त्याला कळलं… हाच तो क्षण! हीच ती वेळ!!! काम कडून राम कडे जाणाऱ्या भक्ती मार्गावरील जीवनयात्रा सुरू करण्याची!! तुलसीदास पुन्हा वळून न पाहण्यासाठी, निघून गेला त्या वाटेला! एक गृहस्थ, संन्यासी झाला.

त्याच्या हातून रामचरितमानस या महान ग्रंथाचं, आणि अशाच अनेक ग्रंथांचे सृजन झालं. घरा-घरात राम भजन निनादलं! तुलसीदास संत तुलसीदास पदाला पोहोचला.

पण… या सगळ्यात सगळ्यांनाच विसर पडला त्या पहिलं चैतन्य स्फुल्लिंग चेतवणा-या समिधेचा! रत्नावली ख-या अर्थाने गुरू ठरली तुलसीदास ला योग्य मार्गदर्शन करणारी, त्याला राम भेटवणारा योग्य मार्ग दाखवणारी! किती महान स्त्री म्हणावी ती… जिच्या हृदयात अगाध भक्ती भाव तर होताच, पण पतीवर ही प्रगाढ प्रेम होतं! म्हणूनच तर तिच्या दिव्य दृष्टीला आपल्या पतीचं दिव्यत्व जाणवलं ना! 

हे विसरून कसं चालेल की…

रत्ना नसती तर तुलसीदास सारखं रत्न झालंच नसतं, आणि तुलसीदासला ही राम रतन धन प्राप्त झालंच नसतं! 

रत्नावली ने दाखवून दिलं की, खरं प्रेम तेच, जे ईश्वरा जवळ घेऊन जाते. 

रत्नावली चं एकाकी जीवन स्विकारण्याचं पेललेलं आव्हान उपेक्षून नाहीच ना चालणार!! 

शेवटी तीसुद्धा एक स्त्री च होती. तिला ही वाटलंच असेल ना, की पतीने प्रपंच आणि परमार्थ दोन्ही साधून जीवन आपल्याबरोबर व्यतीत करावे!! तो असा कायमचा त्यागून निघून जाईल, हा तिच्या साठी धक्काच होता. एक आव्हान तिने पेरलं पतीच्या मनात, तर एक आव्हान तिच्या ही वाट्याला आलंच पेलण्यासाठी! एकाकी जीवन, आजीवन जगण्याचं! 

मग रत्नावली ने आपलं एकटेपणाचं दु:ख, ती बोचणारी सल, ती विरह व्याकुळ, झुरणा-या मनाची विकल अवस्था तिने… अनेक, असंख्य दोह्यांत, झरझर वाहणा-या अश्रूंच्या साक्षीने प्रतिबिंबित केली. वियोगाचं दु:ख स्पष्ट दिसतं त्यांत!! इतकंच नाही तर, रत्नावली च्या ज्ञानाचं, विद्वत्तेचे ही प्रतिबिंब दिसतं त्यात! तिचे दोहे, त्यांची भाषा आणि त्यांतील भाव हे दोन्ही उच्च कोटीचे आहेत. काही ठिकाणी तर तुलसीदास पेक्षाही उत्कृष्ट आहे, सरस आहे ती! पण तिची ही काव्यप्रतिभा उपेक्षितच राहिली. मुळात प्रत्येक यशस्वी पुरुषामागे खंबीरपणे, ठामपणे उभी राहणा-या स्त्री चा त्याग, समर्पण, एकाकीपण, तिचं मोठेपण… नेहमीच अलक्षित, उपेक्षित, दुर्लक्षित राहतं! 

तीच उपेक्षा रत्नावली च्या ही वाट्याला आली.

पण हे विसरून चालणार नाही की…

रत्नावली ने पतीला धिक्कारले नसते तर रामबोलागोस्वामी तुलसीदास कसा बरं झाला असता?? 

 पतीच्या मनात रामभक्तीचं स्फुल्लिंग चेतवणारी, चैतन्य जागवणारी, तेजोमयी समिधा च ना ही रत्नावली!! 

रत्ना अगर ना होती तो तुलसी जैसा रतन नहीं होता!

– लेख क्र. ५.

© प्रा.भारती जोगी

पुणे.

 फोन नंबर..९४२३९४१०२४.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ श्री रविंद्रनाथ टागोर यांची “गीतांजली”… भाग – २२ ☆ सौ.मंजिरी येडूरकर ☆

श्री मंजिरी येडूरकर

? इंद्रधनुष्य ?

☆ श्री रविंद्रनाथ टागोर यांची “गीतांजली”… भाग – २२ ☆ श्री मंजिरी येडूरकर ☆

श्री रविंद्रनाथ टागोर

जवळजवळ १६५ वर्षांपूर्वी कोलकत्ता जवळच्या ‘जोरासांको’ येथील ठाकूर घराण्याच्या महाल सदृश घरात ७ मे १८४१ रोजी रविंद्रनाथांचा जन्म झाला. वडील महर्षी देवेंद्रनाथ व आई शारदा देवी यांचं ते चौदावं अपत्य होते. साहजिकच त्यांना आईचा सहवास फार वर्षे लाभला नाही. वडील पण सतत प्रवासांत असत. ऋषीतुल्य व्यक्तिमत्वाचे देवेंद्रनाथ वरचेवर हिमालयात भटकंती करत, तिथे जाऊन रहात, त्यामुळे त्यांचा सहवास देखील फारसा मिळायचा नाही. पण जेंव्हा रविंद्र उर्फ ‘रोबी’ ने शाळे विषयीच्या तक्रारी त्यांना सांगितल्या तेंव्हा त्यांना फार वाईट वाटले व त्यांनी रोबीला शाळेतून काढले ते कायमचेच.

घरीच वडील त्यांना शिकवू लागले. प्रवासात ते रोबीला आपल्या सोबत घेऊन जाऊ लागले. तिथे निसर्गाच्या सानिध्यात शाळेत न मिळणारं, पण बौद्धिक व भावनिक जग समृद्ध करणारे शिक्षण सहज बोलता बोलता रोबीला मिळू लागलं. वडिलांबरोबर केलेला प्रवास, हिमालयातील भटकंती, निसर्गाकडून व वडिलांकडून मिळालेलं ज्ञान हा रविन्द्रनाथ यांच्या जीवनातला सुवर्णकाळ होता. याच काळात या शाळा सोडून दिलेल्या तथाकथित अज्ञानी मुलाचं रूपांतर एका सुसंस्कृत मुलात झालं. (The ugly duckling was transformed into an admired swan) ही शिदोरी त्यांना नोबेल पुरस्कारा पर्यंत घेऊन गेली व शिक्षणपद्धतीचा कायापालट करणाऱ्या शिक्षणमहर्षी या पदवीपर्यंत घेऊन गेली. पूर्ण भारताने नाही तर जगाने त्यांना कलाक्षेत्र, शिक्षणक्षेत्र, समाजसुधारणेचं क्षेत्र, तत्वज्ञानाचे क्षेत्र अशा अनेक क्षेत्रांतील गुरुपद बहाल केलं व गुरुदेव या पदवीने सन्मानित केलं. कोणतेही समाजमान्य पारंपारिक शिक्षण न घेतलेला, कोणत्याही विद्यापीठाची कसलीही पदवी गाठीशी नसलेला हा माणूस शिक्षणक्षेत्रात ‘न भूतो न भविष्यति’ असा प्रयोग यशस्वीपणे करून दाखवतो ही गोष्ट अचंबित करणारी आहे.

त्यांच्या मनात शाळेविषयी तिरस्कार निर्माण करणाऱ्या, त्या काळी सर्वसंमत असणाऱ्या, मुलांना शारीरिक क्लेश देणाऱ्या, अपमानास्पद शिक्षा करणाऱ्या पद्धतीचे जगाने खरंतर आभारच मानायला हवेत कारण त्यामुळेच रविंद्रनाथांनी शाळा सोडली. वडिलांकडून, निसर्गाकडून, पुस्तकां कडून ज्ञान मिळवून ते संवेदनशील विचारवंत, हरहुन्नरी कलाकार बनले.

रविंद्रनाथांनी लहानपणीच तीन तीन क्रांतीकारी चळवळी खूप जवळून पाहिल्या, अनुभवल्या. एक म्हणजे राजा राममोहन रॉय यांची धार्मिक पुनरुत्थानाची चळवळ, ज्यातून ब्राह्मो

समाजाची निर्मिती झाली. दुसरी म्हणजे बंकिमचंद्र चटर्जी यांनी चालू केलेली साहित्यिक चळवळ, ज्यामुळे भारतीय, वाङ्मयीन विश्व खडबडून जागे झाले. आणि तिसरी राजकीय चळवळ ‘Indian National movement’, जी राजकीय व सांस्कृतिक दडपशाहीचा निषेध करत होती. या तीनही चळवळींत टागोर कुटुंबियांचा सक्रिय सहभाग होता व त्यामुळे बालपणी व तरुणपणी रविंद्रनाथांनी या सर्व हालचाली खूप जवळून पाहिल्या होत्या.

पौर्वात्य व पाश्चिमात्य दोन्ही संस्कृतीतील चांगल्या गोष्टी एकत्र आणून संघर्षाशिवाय मानवजातीच्या कल्याणासाठी काम करावं अशी भावना कदाचित या तिन्ही चळवळींचा त्यांच्या कोवळ्या मनावर झालेल्या परिणामाचा परिपाक असावा.

वयात बरंच अंतर असूनही वडीलबंधू सत्येंद्रनाथांबरोबर रविंद्रनाथांचे वडिलांप्रमाणेच मित्रत्वाचे संबंध होते. आय ए एस असलेल्या सत्येंद्रनाथांच्या देशातील निरनिराळ्या शहरांत बदल्या व्हायच्या पण तिकडे जाऊन रोबी त्यांच्याबरोबर रहात, वेद, उपनिषदे, संत वाङ्मय यांचे वाचन करीत व त्यांच्याबरोबर चर्चा करून आपल्या ज्ञान कक्षा विस्तारित असत.

‘रोबी’ या आपल्या आत्मकथनपर पुस्तकात त्यांनी म्हटलय की, ” ज्या देवाचा व प्रेमाचा माझ्या सर्व साहित्यात संदर्भ आला आहे तो या जीवनाचा देव (God of life) आहे व ते प्रेम जीवनावरील प्रेम आहे. ” त्यांच्या शब्दांतून उमटणारे दैवी सूर, धर्म, भाषा, देश अशा सर्व सीमा लांघून सर्व विश्वात घुमले. आपल्या एका कवितेत ते स्वतःलाच सांगतात, “Move out of yourself, stand out in the open, you will hear the music of the universe in your heart. “

—–

☆ गीत : ६४ ☆

ON the slope of the desolate river among tall grasses I asked her, “Maiden, where do 

you go shading your lamp with your mantle? My house is all dark and lonesome ⎯ lend 

me your light! ” She raised her dark eyes for a moment and looked at my face through 

the dusk. “I have come to the river, ” she said, “to float my lamp on the stream when the 

daylight wanes in the west. ” I stood alone among tall grasses and watched the timid 

flame of her lamp uselessly drifting in the tide.

In the silence of gathering night I asked her, “Maiden, your lights are all lit ⎯ then where do you go with your lamp? My house is all dark and lonesome, ⎯ lend me your light. ” 

She raised her dark eyes on my face and stood for a moment doubtful. “I have come, ” she said at last, “to dedicate my lamp to the sky. ” I stood and watched her light 

uselessly burning in the void.

In the moonless gloom of midnight I asked her, “Maiden, what is your quest holding the 

lamp near your heart? My house is all dark and lonesome, ⎯ lend me your light. ” She 

stopped for a minute and thought and gazed at my face in the dark. “I have brought my light, ” she said, “to join the carnival of lamps. ” I stood and watched her little lamp uselessly lost among lights.

—–

☆ मराठी भावानुवाद : गीत :६४ ☆

नदीच्या उतरणीला उभा मी असताना,

मज दिसली ती, झाकुनि एक दीप नेताना

 

निघालीस कोठे हा दीप 

तुझा घेउनि?

देशील कां, घर माझे

आले अंधारुनि?

 

डोळे मोठ्ठे करूनि क्षण

मजकडे पाही

म्हणे मावळतीला सोडेन नदी प्रवाही

 

भित्री ज्योत थरथरुनि

वहातच गेली 

निशेच्या तमी पुन्हा दिवा घेउनि दिसली 

 

आता तरी देशील कां,

घर माझे उजळण्या?

म्हणे दिवा हा आणिला

नभासि अर्पिण्या

 

अवकाश पोकळीत दीप व्यर्थ तेवला

गडद रात्री, आली फिरुनि,

दीप छातीशी धरिला 

 

पुन्हा मी पुसले, टक लावुनि, पहात म्हणते

आनंदोत्सव असे दिव्यांचा, त्याचसाठी नेते

 

अनंत दिवे, ध्येय रहित, तेवती प्रकाशात

ती अन् तिचा दीप दोन्ही हरवले गर्दीत

 

भक्तीचा दीप न मिळे, असा आयता कोणास

ज्याचा त्याने तो ठेवावा चेतवुनि हृदयास

 

भावानुवाद ©️ मंजिरी येडूरकर 

संपर्क: ९४२१०९६६११

—–

☆ गीत : ६५ ☆

WHAT divine drink wouldst thou have, my God, from this overflowing cup of my life?

My poet, is it thy delight to see thy creation through my eyes and to stand at the portals 

of my ears silently to listen to thine own eternal harmony?

Thy world is weaving words in my mind and thy joy is adding music to them. Thou givest 

thyself to me in love and then feelest thine own entire sweetness in me.

—–

☆ मराठी भावानुवाद : गीत: ६५ ☆

*

भरुनी वाहतो देवा

सुखी जीवनाचा ठेवा

*
तूच दिले मज हे जीवन

विविध रसांनी नटवून

*

कोणता रस तुजला

अर्पू मी न कळे मला

*

तूच निर्मिलेले जग 

मम नेत्री पाहशील का?

संगीत तूच निर्मिलेले

मम श्रोत्री ऐकशील का?

*

विश्व तुझेच मम हृदयी

गोफ विणे शब्दमयी

*

अलौकिक तव आलापी

सुखदायक हो भवतापी

*

बली सम तू दाता असशी

मम चेतसी तुलाच देशी

*

तव माधुरी मी हृदयी धरी

तव हृदयांगण जी तृप्त करी

भावानुवाद ©️ मंजिरी येडूरकर

संपर्क: ९४२१०९६६११

—–

☆ गीत ६६ ☆

SHE who ever had remained in the depth of my being, in the twilight of gleams and of glimpses; she who never opened her veils in the morning light, will be my last gift to thee, my God, folded in my final song.

Words have wooed yet failed to win her; persuasion has stretched to her its eager arms in vain.

I have roamed from country to country keeping her in the core of my heart, and around her have risen and fallen the growth and decay of my life.

Over my thoughts and actions, my slumbers and dreams, she reigned yet dwelled alone and apart.

Many a man knocked at my door and asked for her and turned away in despair.

There was none in the world who ever saw her face to face, and she remained in her 

loneliness waiting for thy recognition.

—–

☆ मराठी भावानुवाद : गीत: ६६ ☆

*

जी अंतरात माझ्या, ती संधीप्रकाश किरणात

कुणी न तिज पाहिले, दिवसाच्या प्रकाशात

*

प्रेमयाचना शब्दांची, फोल तिला जिंकण्यास 

प्रयत्न निष्फळ होत, तिचे मन वळविण्यास

*

देशोदेशी फिरलो, हृदयात तिज स्थापुनि

आयुष्याचे चढउतार, भोवती तिच्या गुंफुनि

*

अनन्य भक्ती तुजप्रती, हृदयी येई उमलुनि

मार्ग चाललो, जो दिला तिनेच मला दावुनि 

*

सत्ता तिचीच, मम स्वप्न, विचार वा कृती

निराश झाले, ज्यांना ती मागून हवी होती

*

वाट पाहते, तव मान्यतेची, एकटीच राहुनि

अर्पण करी, तिज देवा, अखेरच्या गीतातुनि

*

– क्रमशः भाग २२..

मूळ इंग्लिश काव्य : श्री. रविंद्रनाथ टागोर.

भावानुवाद : कवयित्री : © सौ.मंजिरी येडूरकर

लेखिका व कवयित्री, मो – 9421096611

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ सुरांचा वसंत हरपला… ☆ राधिका भांडारकर ☆

राधिका भांडारकर

? इंद्रधनुष्य ?

☆ सुरांचा वसंत हरपला… ☆ राधिका भांडारकर

आशाताईंच्या एका वाढदिवसाच्या निमित्ताने कवीवर्य सुरेश भटांनी त्यांच्यासाठी एक कविता पाठवली होती. शब्द असे होते…

आता न तुझे कुठल्याही जखमांशी देणे घेणे 

पाऊस तुझ्यावर साऱ्या सौख्याचा बरसत राहो

हा कंठ तुझा अलबेला हा रंग तुझा मतवाला

तलवार तुझ्या गाण्याची बिजलीसम चमकत राहो

तू सरगम सुखदुःखाचा जपलास कसा उमजेना 

हा कैफ तुझा माझ्या धमन्यातून उसळत राहो 

… खरं आहे. आज देहाने त्या आपल्यात नसल्या तरी त्यांच्या सुरात तो सळसळता कैफ मात्र चिरंतन, अविनाशी राहणार.

काल त्यांच्या निधनाची बातमी ऐकल्यानंतर मन प्रचंड सैरभैर झालं. मनात आलं, लता आणि आशा नाहीत अशा जगात आता आपल्याला जगण्याची सवय करावी लागणार. चार वर्षांपूर्वी लतादीदींचे निधन झाले आणि त्याच वाटेने आता आशाताई रसिकांच्या मनावर एक पोरकेपणाची भावना ठेवून निघून गेल्या.

भारतीय सुगम संगीत क्षेत्रातल्या एका सुस्वर युगाचा अंत झाला. लता म्हणजे भगवंताची बासरी तर अशा म्हणजे राधेच्या मनातल्या कृष्णाचा सूर होता.

चाळिशीच्या दशकात चित्रपट बोलू लागला आणि गाऊही लागला. त्याच सुमारास लता आणि आशा नावाची संगीताच्या नभांगणात नक्षत्रे उगवली. दत्ता डावजेकरांचे संगीत असलेले ‘माझा बाळ’ या चित्रपटात,

चला चला नव बाळा हे गीत आशाताईंनी गायले आणि इथून पुढे सुरांच्या दुनियेत जे घडले तो चमत्कारच म्हणावा लागेल. नंतरच्या पिढ्यांसाठी संगीतातले महत्त्वाचे ब्रँड त्यांनी अधोरेखित केले. आजही संगीताच्या रिअॅलिटी शोमध्ये प्रामुख्याने आशा, लता, रफी, मुकेश, किशोर कुमार यांचीच गाणी नव्या पिढ्यांकडून गायली जातात. कित्येक गायक झालेत, होतीलही पण या सुरांचं अलौकिकत्व, तो करिष्मा केवळ अजोड आहे.

आशाताईंच्या गाण्याचे वैशिष्ट्य हे की त्यांच्या गळ्याला पेलवत नाही किंवा बसत नाही अशी कुठलीच स्वररचना नाही. त्यांचा कंठ खऱ्या अर्थाने अष्टपैलू. त्यांचे वडील दीनानाथ मंगेशकर यांचे पल्लेदार सूरही सहजपणे त्यांच्या गळ्यातून उतरले. “शूरा मी वंदिले. ” किंवा मर्मबंधातली ठेव ही” सारखी नाट्यगीते म्हणजेच एक वस्तुपाठ आहे. हिंदुस्थानी गायकीचे थाट, रंग त्यातून उलगडले. त्याच गळ्यातून अवखळ, उडती, मदमस्त शृंगारिक गाण्यांची बरसात झाली. अनवट गझला त्यांनी गायल्या. त्यांच्या गळ्यात फक्त सात स्वरच नव्हते तर सात ऋतूंचाच मुक्काम होता जणू काही. असा प्रवाही गळा म्हणजे केवळ भगवंतांचेच देणे म्हणावे लागेल.

मोठ्या झाडाखाली छोटे झाड वाढत नाही असे म्हणतात पण लतादीदीच्या वटवृक्षासमान सावलीत आशाताईंच्या स्वरवेलींचा मांडवही जोमाने बहरत गेला आणि सर्व प्रकारच्या मानमरातबाने आणि किताबाने त्यांची जोडी भरून गेली. स्वरसम्राज्ञी आशा भोसले अशी स्वतंत्र ओळख त्यांनी मिळवली. गाणे कुठलेही असो,

“ एका तळ्यात होती बदके पिले सुरेख”

किंवा

“छोड दो आँचल चल जमाना क्या कहेगा”

किंवा अगदी अलीकडचं,

“ सपने मे मिलता है मुंडा मेरा सपने में मिलता है “

… शब्द, भाव आणि अभिनयाने भरलेलं त्यांचं गाणं ऐकणाऱ्याच्या काळजात रुतून बसतं.

वयाच्या नव्वदीत सुद्धा त्या भरजरी साडी आणि चमचमता रत्नहार परिधान करून मंचावर येऊन “ओ मेरे सोना रे सोना रे” गायला लागल्या की श्रोतृवर्ग अक्षरशः पागल होऊन जायचा.

रसिकांना त्यांनी फक्त गाणं दिले नाही तर या जन्मावर शतदा प्रेम करायलाही शिकवलं. त्यांनी प्रत्यक्षात त्यांच्या मोडक्या संसाराची लाज टाकून चित्रपट गीत क्षेत्रात एक जबरदस्त ठसा उमटवला.

त्यांच्या आयुष्यात प्रचंड संघर्ष होता. टक्केटोणपे, मानापान त्यांनी सहन केले. जीवन म्हणजे एक भलं मोठं प्रश्नचिन्ह होतं पण त्याला त्यांनी त्यांच्या कंठात असलेल्या दैवी सुराने आणि आत्मविश्वासाने सडेतोड उत्तर दिले.

एका मुलाखतीत त्या म्हणाल्या होत्या, “स्वतः भोगलेल्या वेदनेतूनच खरा कलाकार जन्म घेतो”

त्यांच्या असामान्यत्वातही त्यांनी एक सामान्यपण जपलं होतं. त्या एकदा म्हणाल्या होत्या,

“आज मी तुमच्यासमोर गायिका म्हणून उभी असले तरी मी एक गृहिणी आहे, माझं मन स्वयंपाक घरात रमतं. मला माझ्या मुलांना, इतरांना! सर्वांनाच स्वादिष्ट खाद्यपदार्थ स्वतः बनवून खाऊ घालण्यात फार आनंद वाटतो, अगदी माझ्या गाण्याइतकाच. ”

त्यांचा व्यासपीठावरचा गप्पिष्ट, मोकळा, मी तुमच्यातलीच असा जाणवून देणारा वावर हेच सांगायचा की, वय हा एक निव्वळ आकडा आहे, त्यांनी १२००० च्या वर गाणी गायली असतील पण त्यांना मात्र त्याचे मुळीच कौतुक नव्हते. अजूनही हजारो गाणी गाण्याचा उत्साह त्यांच्यात टिकून होता हे विशेष. त्यांचा सूर म्हणजे मूर्तिमंत चैतन्य. उत्साह म्हणजे एखादा अवखळ धबधबाच. जीवनावरचे प्रेम त्यांच्या गायकीतून जाणवायचं. व्यक्त व्हायचं.

“भोगले जे दुःख ज्याला सुख म्हणावे लागले” ही आशाताईंनी गायलेली गझल खोल पाण्याच्या तळाशी नेते.

“जिवलगा राहिले हे दूर घर माझे

पाऊल थकले माथ्यावरचे जड झाले ओझे.. ”

ही विराणी गावी तर ती फक्त आशाताईंनीच.

त्यांची किती गाणी आठवावीत? किती सूर साठवून ठेवावेत हृदयाच्या कप्प्यात?

आशाताईंच्या निधनाचे वृत्त ऐकताच मनात याच ओळी घुमल्या.

“ही घटकेची सुटे सराई मिटले दरवाजे

” जणू काही अशाताईंच्या जाण्याचा संपूर्ण भावार्थ याच ओळीत साठलेला आहे.

शब्दसुरांना मरण नसते. सूरात्मा अमर असतो. पिढ्यानुपिढ्या ही संगीत सरिता अशीच झुळझुळ वाहत राहणार आणि या सूरगंगेच्या किनारी उभं राहून सारं चराचर त्यांना आदरांजली वाहत राहणार.

© राधिका भांडारकर

पुणे

मो.९४२१५२३६६९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ अशीही असते चॅरिटी.. – माहिती संग्राहक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

श्री सुनीत मुळे

 

? इंद्रधनुष्य ?

☆ अशीही असते चॅरिटी.. – माहिती संग्राहक : अज्ञात  ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे 

अशीही असते चॅरिटी‘!!!’

*”माझ्या गरिबीला कंटाळून तू मला सोडलं होतंस ना? बघ आज मी या जिल्ह्याचा कलेक्टर आहे! ” साहेबांनी भर शाळेत घटस्फोटित बायकोचा अपमान केला… पण जेव्हा मुख्याध्यापकांनी सत्य सांगितलं, तेव्हा साहेबांचा श्वासच कोंडला! *

*वाशिम जिल्ह्यातील ‘शिरपूर’ गावची ती एक जुनी जिल्हा परिषद (ZP) शाळा. सकाळची वेळ होती. अचानक शाळेच्या गेटवर पोलिसांच्या गाड्या आणि लाल दिव्याची गाडी येऊन थांबली. वाशिम जिल्ह्याचे नवे आणि अत्यंत कडक शिस्तीचे ‘जिल्हाधिकारी’ (Collector) अविनाश पाटील साहेब शाळेच्या अचानक तपासणीसाठी (Surprise Visit) आले होते. *

अविनाश साहेब रुबाबात गाडीतून उतरले. मुख्याध्यापक आणि शिक्षक घाबरून स्वागताला धावले. साहेब एक-एक वर्ग तपासत पुढे जात होते. सातवीच्या वर्गात साहेब शिरले आणि फळ्यावर गणितं शिकवणाऱ्या शिक्षिकेने मागे वळून पाहिलं. साहेबांची पावलं तिथेच थबकली! त्यांचा श्वास एका सेकंदासाठी रोखला गेला.

ती शिक्षिका दुसरी कुणी नसून अविनाशची घटस्फोटित बायको, ‘पल्लवी’ होती! अंगावर एक अत्यंत साधी, विटलेली सुती साडी, डोळ्यांखाली आलेली काळी वर्तुळे आणि चेहऱ्यावर एक अजीब शांतता. पाच वर्षांनंतर ते दोघे असे समोरासमोर आले होते. पल्लवीच्या हातातला खडू खाली पडला, पण तिने स्वतःला सावरले आणि ती गप्प उभी राहिली.

तो ५ वर्षांपूर्वीचा कटू भूतकाळ:

पाच वर्षांपूर्वी अविनाश पुण्यात यूपीएससी (UPSC) ची तयारी करत होता आणि पल्लवी एका खाजगी शाळेत ५-७ हजारांवर शिक्षिका होती. अविनाशचे सलग ३ प्रयत्न अपयशी ठरले होते. घरात भयंकर गरिबी होती. नातेवाईक त्याला ‘निकम्मा’ आणि ‘बायकोच्या पैशांवर जगणारा’ म्हणून हिणवायचे.

एके दिवशी पल्लवीने अचानक अविनाशसोबत भयंकर भांडण काढलं. ती जोरात ओरडली होती, “मला तुझ्या या फालतू संघर्षाला कंटाळा आलाय! तू आयुष्यात कधीच एक रुपया कमवू शकणार नाहीस. मी माझा जन्म तुझ्यासोबत गरिबीत सडवू शकत नाही! ” त्या एका अपमानाने अविनाशचा पुरुषी अहंकार दुखावला गेला. रागाच्या भरात दोघांचा घटस्फोट झाला. अविनाश दिल्लीला गेला आणि पल्लवीने वाशिमसारख्या एका मागास गावात बदली मागून घेतली.

तो अपमानाचा प्रसंग आणि साहेबांचा अहंकार:

आज तोच ‘निकम्मा’ नवरा या जिल्ह्याचा राजा (कलेक्टर) बनून तिच्यासमोर उभा होता. अविनाशने शाळेची तपासणी संपवली आणि पल्लवीला मुख्याध्यापकांच्या केबिनमध्ये बोलावले.

केबिनमध्ये फक्त मुख्याध्यापक, अविनाश आणि पल्लवी होते. अविनाशने अत्यंत तुसडेपणाने आणि गर्वात पल्लवीकडे बघून म्हटलं,

“काय मॅडम? पाच वर्षांपूर्वी माझ्या गरिबीला आणि बेरोजगारीला कंटाळून तुम्ही मला सोडून गेला होतात ना? तुम्हाला वाटलं होतं मी रस्त्यावर येईन. पण आज डोळे उघडून बघा… तोच ‘निकम्मा’ नवरा आज या पूर्ण जिल्ह्याचा ‘कलेक्टर’ बनून तुमच्यासमोर बसलाय! आणि तुम्ही? तुम्ही आजही या खेड्यातल्या फाटक्या शाळेत ५० पोरांना शिकवत खितपत पडला आहात. आज तुम्हाला तुमच्या निर्णयाचा नक्कीच पश्चात्ताप होत असेल! ”

पल्लवी काहीच बोलली नाही. तिने फक्त डोळे खाली वळवले आणि तिच्या गालावरून एक अश्रू खाली ओघळला. ती केबिनच्या बाहेर जायला वळली.

तो सत्याचा स्फोट आणि पायाखालची जमीन सरकवणारा प्रसंग:

तेवढ्यात वयस्कर मुख्याध्यापक (शिंदे सर) पुढे आले आणि त्यांनी पल्लवीला थांबवले.

“पल्लवी मॅडम, आज साहेबांना सत्य सांगाच… नाहीतर हे आयुष्यभर तुम्हाला स्वार्थी समजतील! ”

अविनाशने रागाने विचारले, “कोणतं सत्य शिंदे सर? हिने स्वतःच्या स्वार्थासाठी मला सोडलं होतं, हेच सत्य आहे. ”

शिंदे सरांचे डोळे पाणावले होते. ते साहेबांच्या टेबलाजवळ आले आणि म्हणाले,

*”साहेब, तुम्ही पुस्तके वाचून कलेक्टर झालात, पण माणसं वाचायला पार विसरलात! पाच वर्षांपूर्वी जेव्हा तुम्ही पुण्यातून दिल्लीला गेलात, तेव्हा दिल्लीच्या ‘संकल्प आयएएस (IAS) अकॅडमीची’ दीड लाखांची फी आणि तुमच्या दर महिन्याच्या मेसचे (जेवणाचे) ४ हजार रुपये कोण भरायचं… याची तुम्ही कधी चौकशी केली का? ”

अविनाश अवाक् झाला. “ते… ते तर मला एका ‘चॅरिटेबल ट्रस्ट’ कडून स्कॉलरशिप मिळत होती. ”

शिंदे सर अत्यंत जड आवाजात म्हणाले,

*”साहेब… ती कोणतीच स्कॉलरशिप नव्हती! या पल्लवी मॅडमने बँकेतून ५ लाखांचं पर्सनल लोन काढलं होतं आणि एका ओळखीच्या ट्रस्टच्या माध्यमातून त्या दर महिन्याला गुपचूप तुमच्या दिल्लीच्या क्लासची फी भरायच्या!

तुमच्या नातेवाईकांचे टोमणे आणि पैशांची तंगी तुमच्या ध्येयाच्या आड येत होती. तुमचा स्वाभिमान बायकोचे पैसे कधीच घेणार नाही, हे पल्लवी मॅडमला माहीत होतं. म्हणून त्यांनी स्वतःला ‘स्वार्थी’ आणि ‘वाईट बायको’ ठरवून तुमच्याशी भांडण केलं… जेणेकरून रागाच्या आणि सूडाच्या आगीत का होईना, पण तुम्ही दिल्लीला जाऊन कलेक्टर बनाल! साहेब… या माऊलीने स्वतःच्या अंगावर साधी नवी साडी घेतली नाही, एक वेळ उपाशी राहिली, पण या फाटक्या शाळेत राहून तिने तुमच्या यशाचा महाल उभा केलाय! “*

अहंकाराचा शेवट आणि पश्चात्तापाचे अश्रू:

हे शब्द ऐकताच कलेक्टर अविनाशच्या पायाखालची जमीनच सरकली! त्याचा श्वास अक्षरशः कोंडला गेला! ज्या खुर्चीवर बसून तो पल्लवीचा अपमान करत होता, ती खुर्ची तिच्याच रक्ता-घामातून बनली होती!

अविनाश वेड्यासारखा खुर्चीवरून उठला आणि त्याने कोणताच विचार न करता, त्या जिल्हा परिषदेच्या केबिनमध्ये थेट पल्लवीच्या पायांवर डोकं ठेवून साष्टांग नमस्कार घातला!

तो लहान मुलासारखा ढसाढसा रडू लागला… “पल्लवी… मला माफ कर! मी नीच आहे. माझ्या यशाच्या अहंकाराने मला आंधळं केलं होतं. तू माझं घर नाही सोडलंस, तू स्वतःला जाळून माझ्या आयुष्यात प्रकाश आणलास! मला शिक्षेचा अधिकार दे, पण मला सोडून नको जाऊस… ”

पल्लवीने रडत त्याला उठवले. त्या दिवशी एका कलेक्टरचा सगळा रुबाब आणि माज एका साध्या झेडपी (ZP) शिक्षिकेच्या त्यागासमोर कायमचा मातीत मिसळला होता. सत्याचा आणि खऱ्या प्रेमाचा असा विजय झाला होता, ज्याने जिल्ह्याच्या राजालाही गुडघे टेकायला भाग पाडले!

आई-वडील आणि बायकोच्या पडद्यामागच्या त्यागाला विसरून, स्वतःच्या यशाचा माज असणाऱ्या आजच्या पिढीच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारी ही कथा*

माहिती संग्राहक : अज्ञात

प्रस्तुती – श्री सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ अजातशत्रू नेता : अटलबिहारी वाजपेयी ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्री विश्वास देशपांडे

? इंद्रधनुष्य ?

☆ अजातशत्रू नेता : अटलबिहारी वाजपेयी ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

मोरारजी देसाई सरकारच्या काळात परराष्ट्रमंत्री पदाची जबाबदारी अटलजींकडे देण्यात आली. दोन वर्षांच्या या मंत्रिपदाच्या कारकीर्दीत अटलजींनी भारत -चीन आणि भारत – पाक संबंध सुधारण्यासाठी आटोकाट प्रयत्न केला. १९७९ मध्ये ते चीन भेटीवर गेले. १९६२च्या युद्धानंतर दोन देशांदरम्यान संबंध सुधारण्याचा हा प्रयत्‍न होता. त्यांनी नंतर पाकिस्तानलाही भेट दिली. त्याआधी १९७१च्या युद्धानंतर भारत व पाक दरम्यान चर्चा आणि व्यापार ठप्प होता. अटलजींनी निःशस्त्रीकरण परिषदेत देशाचे प्रतिनिधित्व केले आणि भारताच्या अणुकार्यक्रमाचे जोरदार समर्थन केले. विदेशमंत्री म्हणून १९७७च्या संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत हिंदी भाषेबद्दल प्रेम असलेल्या अटलजींनी हिंदीतच भाषण करण्याचे ठरवले. राष्ट्रसंघात हिंदीला मान्यता नव्हती. त्यामुळे हिंदीत भाषण करताना त्यांना अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागला. पण ते मागे हटले नाहीत. त्यांना इतका आनंद झाला की ते म्हणाले 

गूंजी  हिंदी विश्वमें 

स्वप्न हुआ साकार 

राष्ट्रसंघ के मंच से 

हिंदी की जयकार!

अटलजींनी आपल्या कार्यकाळात पुढील काही अत्यंत महत्वाची कामे केली. 11 आणि 13 मे 1998 ला पोखरण येथे पाच भुमिगत परमाणु परिक्षण विस्फोट करून अटल बिहारी वाजपेयींनी भारताला परमाणु शक्ती संपन्न देश घोषित केले. ही सगळी प्रक्रिया अत्यंत गोपनीयरित्या पार पाडली गेली. या भारताने टाकलेल्या यशस्वी आणि धाडसी पावलांमुळे पाश्चिमात्य राष्ट्रांना धक्का बसून त्यांनी अनेक अटी भारतावर लादल्या. पण वाजपेयी सरकारने या सर्व गोष्टींचा खंबीरपणे सामना केला.

19 फेब्रुवारी 1999 ला पाकिस्तान समवेत चांगले संबंध प्रस्थापित करण्याकरता पुढाकार घेत सदा. ए. सरहद नावाने दिल्ली ते लाहौर बस सेवा सुरू करण्यात येऊन स्वतः वाजपेयी पाकिस्तानला जाऊन आले. भारत पाक संबंध सुरळीत करण्यासाठी पुढाकार घेतला. महत्वाची शहरे महामार्गांनी जोडण्यासाठी स्वर्णिम चतुर्भुज परियोजना कार्यान्वित केली. 100 वर्षांपेक्षा अधिक जुना असलेला कावेरी जलविवाद सोडविला.

देशातील सर्व विमानतळांचा आणि राष्ट्रीय महामार्गांचा विकास केला: कोकण रेल्वे व नव्या टेलीकाॅम नितीची सुरूवात करून पायाभूत विकास करण्याकरीता पाऊले उचलली. आर्थिक सल्लागार समिती, व्यापार व उद्योग समिती, राष्ट्रीय सुरक्षा समितीची रचना केली त्यामुळे कामांचा वेग वाढला. याशिवाय लोकहिताच्या दृष्टीने अनेक महत्वाची कामे तडीस नेली.

अटलजी म्हणजे एक कवी मनाचा राजकारणी. संगीत, कलांचा आस्वाद घेणारा एक रसिक. काव्यशास्त्र विनोदात रमणारा एक जिंदादिल माणूस… राजकारणाच्या धामधुमीतही अटलजींची काव्य आणि लेखन प्रतिभा कार्यरत होती. मेरी संसदीय यात्रा, मेरी इक्यावन कविताये, संकल्प काल, शक्ती से शांती, फोर डीकेड्स इन पार्लमेंट, कैदी कविराज की कुंडलिया आदी त्यांची पुस्तके प्रसिद्ध आहेत. जीवनाबद्दल एका कवितेत सुरेख भाष्य करतात 

 जन्म मरण का अविरत फेरा

जीवन बंजारो का डेरा

आज यहाँ कल कहाँ कूच  है

कौन जानता किधर सवेरा…

भविष्याचा वेध घेणारी त्यांची नजर सर्व समाजाला आणि दिशाहीनांना नवी दिशा देत होती.

हम पडाव को समझे मंझिल

लक्ष्य हुआ आँखो से ओझल

वर्तमान के मोहजाल मे

आनेवाला कल न भुलाए

आओ फिर से दिया जलाएँ…

आपल्या वाणीनं सार्वजनिक सभा आणि संसद गाजवणारे अटलजी तसे मितभाषी होते. त्यांना निसर्गात रमायला, निसर्गाची विविध रुपं बघायला आवडायची. ते संगीताचेत्यांचा छंद होता. गीत रामायण ऐकायला त्यांना अतिशय आवडायचं. त्यामुळे बाबुजींशी म्हणजेच सुधीर फडकेंशी त्यांची खास मैत्री होती. भीमसेन जोशींनाही ऐकायला ते अतिशय उत्सुक असत. भीमसेन जोशींची खास मैफिल वाजपेयी पंतप्रधान असतानापुण्यात झाली होती. पण कवी मनाच्या अटलजींनी कारगिल युद्धाच्या वेळी कणखर भूमिका घेतली.

दांव पर सब कुछ लगा है

रुक नही सकते, टूट सकते

है मगर हम झुक नही सकते…

ते आपल्या कवितांबद्दल बोलताना म्हणतात 

’’माझ्या कविता म्हणजे युध्दाची घोषणा करण्यासारख्या आहेत ज्यात हारण्याची भिती नाही, माझ्या कवितांमधे सैनिकाला हरण्याची भिती नाही तर जिंकण्याची आस असेल. माझ्या कवितांमधे भिती चा आवाज नव्हें तर जिंकण्याचा जयघोष असेल. ’’

अटलजींना आपल्या आयुष्यात अनेक मोठमोठे सन्मानाचे पुरस्कार लाभले. या विद्वान, कवी मनाच्या आणि स्वच्छ चारित्र्याच्या नेत्याचा गौरव 25 डिसेंबर 2014 ला भारताचा सर्वोच्च पुरस्कार ’’भारतरत्न’’ देण्यासाठी देऊन करण्यात आला. भारताचे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी स्वतः 27 मार्च 2015 ला अटलजींच्या घरी त्यांना हा पुरस्कार देण्याकरता गेले. अटलजींना मिळालेला सर्वात मोठा पुरस्कार म्हणजे त्यांनी भारतवासीयांच्या हृदयात कायमचे आदराचे स्थान मिळाले आहे. हीच खरी त्यांच्या कामाची पावती आहे.

२५ डिसेंबर हा अटलजींचा जन्मदिवस “गुड गव्हर्नन्स डे” अर्थात “सुशासन दिन” म्हणून साजरा केला जातो. आजच्या काळात खरी गरज अटलजींसारख्या स्वच्छ, चारित्र्यवान, अभ्यासू आणि निष्कलंक नेत्यांची आहे. अटलजी आज जरी आपल्यात नसले तरी जीवन कसं जगावं याचा आदर्श त्यांनी आपल्या उदाहरणातून घालून दिला आहे. ज्यांना वाजपेयींना समजून घ्यायचं असेल त्यांनी त्यांच्या विविध विषयावर केलेल्या अभ्यासपूर्ण भाषणांचा जरूर अभ्यास करावा.

© श्री विश्वास देशपांडे

चाळीसगाव

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “समिधाच सख्या या!!” – लेख क्र. ४ ☆ प्रा.भारती जोगी ☆

प्रा.भारती जोगी

? इंद्रधनुष्य ?

☆ “समिधाच सख्या या!!” – लेख क्र. ४. ☆ प्रा.भारती जोगी ☆

एमिली शेंकल

समिधाच सख्या या!! …

सन १९४५, ऑगस्ट महिना, संध्याकाळ ची वेळ! ती स्वयंपाकघरात नेहमीसारखी कामात… आणि अचानक रेडिओ वर ऐकायला येते… ‘ सुभाषचंद्र बोस यांचा विमान अपघातात मृत्यू! ‘

 ती हळूच उठते, बेडरूममध्ये जाते, जिथे तिची जेमतेम ३ वर्षे वयाची मुलगी झोपलेली असते. बिछान्याजवळ गुढगे टेकून बसते आणि आयुष्यात पहिल्यांदाच मनाने कोसळते… अश्रूंचा बांध फुटतो, मनसोक्त रडते. जिच्या दृढतेसाठी, साहसी स्वभावासाठी तिचा पती बाघिन म्हणत असतो… ती रडत होती, शक्तीच संपल्या सारखी!!

 ती होती… एमिली शेंकलकॉंग्रेस योद्धा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नेताजी सुभाषचंद्र बोस यांची पत्नी!!

 एमिली च्या डोळ्यांपुढून सगळा जीवनपट सरकू लागला. आठवला तिला तो दिवस… सुभाषबाबूंच्या परिचयाचा!

सविनय कायदेभंगाच्या चळवळीमुळे तुरूंगात गेलेल्या सुभाष बाबूंची तब्येत ढासळू लागली, ब्रिटिश सरकारने उपचारासाठी त्यांना व्हिएन्ना मध्ये ठेवले. हॉस्पिटलमध्ये सुद्धा देशाचाच विचार करणा-या सुभाष बाबूंनी, भारतीय युवकांना स्वातंत्र्य लढ्यासाठी एकत्रित करण्याचं ठरवलं. द इंडियन स्ट्रगल या नावाने पुस्तक लिहायला घेतलं. त्यासाठी टाइपिस्ट ची गरज भासली. आणि मुलाखतीत निवड होऊन एमिली शेंकल चा सुभाषबाबूंच्या आयुष्यात प्रवेश झाला. हळूहळू रोजच्या भेटीतून… सौम्य स्वभाव, हसतमुख, स्पष्टवक्ती, निस्वार्थी, कामाला वाघ… अशा एमिली कडे सुभाषबाबू आकर्षित झाले. देशप्रेम अग्रस्थानी असलेल्या मनात… एका उदात्त अशा प्रेमाने अलगद प्रवेश केला. आजपर्यंत घरच्यांना लग्नासाठी नेहमीच नकार देणारे दोघेही… नकळतपणे गुंतले.

२६ डिसेंबर १९३७ या दिवशी… एमिली च्या वाढदिवशी… दोघांनी अखेर गुप्त विवाह केला. आणि शेवटपर्यंत तो गुप्तच ठेवला. कारण सुभाष बाबूंसाठी देश सर्वोपरि होता. हे एमिली पूर्णपणे जाणून होती. म्हणूनच उदात्त हेतू आणि एक शोकांतिका असलेलं नातं तिने जोडलं. उदात्त हेतू ला उदात्त अशी साथ देऊन त्यांची खरी हमराज बनली. तिनं सुभाष बाबूंच्या संघर्षाला समजून घेतलं. त्या नात्यात एमिली ने अदम्य साहस, सर्वोच्च गरिमा आणि उच्च त्यागाची भावना… हे गुण पेरले, रूजवले.

लग्नबंधनात बांधल्या नंतरही तिने सुभाषचंद्र ना मात्र आपल्या प्रेमात बांधून न ठेवता… आजाद ठेवलं.

सुभाषचंद्र जरी एक सैनिक, एक योद्धा, एक कूटनीतिचा महारथी होते तरीही… या सगळ्याच्या आंत/आड आणखी एक सुभाष आहे… हे एमिली ने ओळखलं होतं. आणि फक्त त्या मौन स्नेहातलं एक आगळं-वेगळं प्रेम, ते जपणं तिनं ओळखलं. त्यामुळे च तर… १२ वर्षांच्या लग्नाच्या आयुष्यात फक्त ३ वर्षे सहवास लाभला तरीही एमिली ने हे… दुराव्यातलं दृढ नातं ही जपलं! कधीच दुरावू दिलं नाही. सुभाषबाबू आणि तिच्यातलं हे अनोखे, गुप्ततेतले पती-पत्नीचं नातं, हे स्नेहबंध… ख-या अर्थाने बद्ध झाले ते… सुभाषबाबूंनी विविध ठिकाणाहून एमिली ला पाठवलेल्या पत्रांमध्ये! ही पत्रे त्यांच्या मर्मबंधातली ठेव बनली.

पण ही पत्रे… प्रेम पत्रे होती कां? की दोन जीवांचं तादात्म्य पावणं? एकमेकांसाठी संबल… सहयोगी, आधार, ख-या अर्थाने, सहचर बनंत, दूर राहूनही एकमेकांना भेटणं, जपंत रहाणं होतं ते! नात्यातील संबोधने सुद्धा बघा… ते फ्राऊलिन शेंकल ने सुरूवात करीत, आणि तिच्या पत्राची सुरूवात असे.. श्री बोस!!

 त्यांनी एकमेकांना लिहिलेल्या पत्रात… राजनीती, विविध पुस्तके संगीत, विनोद, आध्यात्मिकता, आणि एकमेकांच्या नाजूक तब्येतीची चौकशी… हा असे… पत्रातल्या मायन्याचा आयना!!!

सुभाष बाबूंनी एकदा आपल्या मनातलं प्रेम व्यक्त करणा-या… गोएथे या कवीच्या, कालिदासाच्या शाकुंतल मधल्या अनुवादित ओळी शोधायला सांगून… अप्रत्यक्षरित्या भावना प्रकट केल्या. त्या ओळी अशा…

क्या तुम युवा वर्ष के फूलों और उसके पतन के फूलोंको पसंद करोगे?

और वह सब जिससे आत्मा आनंदित हो, तृप्त हो…

 क्या तुम स्वर्ग और पृथ्वी को एक ही नाम से मिला दोगे?

 हे, शकुंतले, मैं तुम्हारा नाम लेता हूं!

बस्स्… हीच ती मनतळातली जाणीव… जिच्या बोधावर एमिली ने नंतरंचं संपूर्ण आयुष्य एक… समर्पित पत्नी, एक आदर्श माता, वृद्ध आईची काठी, लेक अनिता ची सखी, बनून स्वाभिमानाने, स्वबळावर व्यतित केलं.

एमिली ने आपल्या लेकीला… एक अतिशय बुद्धीमान आणि शैक्षणिक रूची असलेली स्त्री बनवलं. एक अर्थशास्त्रज्ञ बनली तिची लेक. विश्वविद्यालयात प्रोफेसर झाली. प्रोफेसर मार्टीन फाफ यांच्या शी विवाह बद्ध झाली.

एमिली… एक आदर्श पत्नी च नाही, तर एक आदर्श माता ही सिद्ध झाली. तिने आपल्या लेकीत… पित्याच्या नावाने मोठी न होता, स्व प्रयत्नाने आपलं आयुष्य उभं करण्याचे, आणि स्व कर्तृत्वाने मोठं होण्याचे, जगाला काहीतरी सकारात्मक देण्याचे संस्कार रूजवले!!!

अशी ही एमिली… जी एका महानायका च्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली, त्याच्या नंतर ही तितक्याच खंबीरपणे, स्वाभिमानाने, पतीच्या परिवाराकडून भारतात येण्याचा आग्रह नाकारून, एका छोट्या टेलिग्राफ ऑफिस मध्ये, कमी पगारावर नोकरी करून, वृद्ध मातेचा सांभाळ करंत, लेकीला सत्याचा सामना करणारी लढवय्यी बनवंत… शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या मनातल्या नायका ची आणि जनातल्या महानायका ची मूक नायिका बनून जगली.

या मौन, मूक संवेदनेला, देश प्रेमासाठी राखरांगोळी करणा-या त्या त्यागकुंडातील राखेच्या कणातला एक भाग बनणारी ही… समिधा च ना?

– लेख क्र. ४.

© प्रा.भारती जोगी

पुणे.

 फोन नंबर..९४२३९४१०२४.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ आठवणींचे पक्षी… ☆ सुश्री शीला पतकी ☆

सुश्री शीला पतकी 

? इंद्रधनुष्य ?

☆ आठवणींचे पक्षी☆ सुश्री शीला पतकी 

महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सभागृहात त्या वेळचे केंद्रीय मंत्री काकासाहेब गाडगीळ, तारकेश्वरी सिन्हा यांना घेऊन आले होते.. काकासाहेब गाडगीळ यांना मी महाविद्यालयीन विद्यार्थिदशेपासूनच ओळखत होतो.. मुंबई प्रांताचे स्पीकर भाऊसाहेब फिरोदिया व काकासाहेब गाडगीळ यांच्या हस्ते मी संपादीत केलेल्या प्रा. रतनलाल सोनग्रा यांच्या व्यासपीठावर या पुस्तकाचे प्रकाशन अहमदनगरला त्या वेळी (१९६६/६७) केले होते.. पुण्यात यावेळी मी किर्लोस्कर मासिकांचा सहसंपादक होतो.. काकासाहेब यांनी मला जवळ बोलावून तारकेश्वरी सिन्हा यांची ओळख करून दिली होती.. आपल्या उर्दू शेरशायरीयुक्त भाषणांसाठी आणि धारदार वक्तृत्वासाठी ओळखल्या जाणाऱ्या तारकेश्वरी सिन्हा यांचे नाव मला माहीत होते.. संसदेतील आपल्या स्पष्ट मतांसाठी त्या प्रसिद्ध होत्या. राम मनोहर लोहियांसारख्या ज्येष्ठ नेत्यांसोबतचे त्यांचे वादविवाद होत असत.. १९६९ मध्ये काँग्रेसमध्ये फूट पडल्यावर, त्यांनी इंदिरा गांधींना सोडून मोरारजी देसाई आणि के. कामराज यांच्यासारख्या काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांशी हातमिळवणी केली होती. त्यानंतर त्या इंदिरा गांधींच्या कट्टर टीकाकार म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या होत्या. तथापि, हे देखील उल्लेखनीय होते की जोपर्यंत त्या राजकारणात सक्रिय होत्या, तोपर्यंत इंदिरा गांधींनी त्यांना काँग्रेसचे तिकीट दिले—अगदी आणीबाणीनंतर झालेल्या निवडणुकांमध्येही. मी तारकेश्वरी यांना किर्लोस्कर साठी मुलाखत देण्याची विनंती करीत असतानाचे हे छायाचित्र आहे.. कैक वर्षानंतर हा फोटो मला सापडला.. व तो प्रसंग मनात तरळून गेला… आठवणींचे पक्षी. ,. ” 

– प्रा. जवाहर मुथा

– – तारकेश्वरी सिन्हा यांच्याबद्दलची वरची पोस्ट आज वाचली. मला त्यांच्याबद्दल फारशी माहिती नव्हती आणि तेव्हा माहितीचे स्त्रोत पण नव्हते मी नुकतीच कॉलेजमध्ये जाऊ लागले होते तेव्हा त्या सोलापुरात आल्या होत्या. त्या इंदिरा गांधीच्या विरोधक आणि माजी पंतप्रधान माननीय मुरारजी भाई देसाई यांच्या पक्षातल्या.. म्हणजे काँग्रेस एस आणि काँग्रेस आय. तेव्हा त्यांचे भाषण पार्क मैदान वर झाले.

काँग्रेसचे विभाजन झाले होते, त्या एस पक्षातल्या होत्या. त्यांच्या कार्यक्रमाला तुफान गर्दी होती म्हणजे पार्क मैदान भरले होते त्यापूर्वी कार्यकर्त्यांसाठी जनरल लायब्ररीच्या वरच्या हॉलमध्ये त्यांचे भाषण झाले. त्या दोन्ही कार्यक्रमाला मी होते. मुख्य म्हणजे संपूर्ण दिवसभर मी तारकेश्वरी सिन्हा बरोबर होते जनरल खूप गप्पा झाल्या. आता माझ्या एवढ्या मुलीशी ती एवढी मोठी विदुषी काय गप्पा मारणार ना? … टिळक स्मारक मधला कार्यक्रम संपून आम्ही पार्क मैदान वर गेलो पार्क मैदान वर वॉशरूमची सोय नाही त्या म्हणाल्या काय करायचे मी म्हणलं काहीतरी सोय करू त्या तिथे संपूर्ण पार्क मैदान च्या बागेची सोय पाहणारे माझ्या वडिलांचे मित्र स्वातंत्र्यसैनिक राजमाने राहत होते म्हणजे ए बी राजमानांचे वडील त्यांच्या घरी आम्ही गेलो आणि काकांना मी अडचण सांगितली. त्यांच्या घरात छोटे बाथरूम होते ते सगळे बाहेर आले तेव्हात्या वाॅशरूम मध्ये फ्रेश झाल्या. काकांनी त्यांना चहा घ्यायला विनंती केली त्या पाच मिनिटे थांबून पाणी पिऊन त्यांच्या घरातून बाहेर पडल्या राजमान्यांचे घर अत्यंत नेटके आणि स्वच्छ होते त्याचे जाताना कौतुक करायला त्या विसरल्या नाही काकूंचा हात हातात घेऊन त्यांनी त्यांच्या घराचे कौतुक केले होते. त्यांचे पार्क मैदान वर भाषण झाले मी बऱ्याच व्यवस्थेत होते, त्यामुळे मला भाषण सलग ऐकता आले नाही आणि काही कळतही नव्हते. राजकारणातले फारसे ठाऊक नाही. पण त्यांचे वक्तृत्व अप्रतिम होते हे कानावर पडणारे शब्दावरून जाणवत होते.

– – आज मी प्राध्यापक मुथा यांचा लेख वाचला आणि मला जाणवले… इतक्या वर्षांनी.. कि आपण केवढ्या मोठे व्यक्ती बरोबर होतो दिवसभर…! पण आपल्याला काही घेता आले नाही कारण ती व्यक्ती किती मोठी आहे याची जाणीवच नव्हती. त्या इंदिरा गांधींच्या प्रखर टीकाकार होत्या. सोलापुरात एस काँग्रेसचे कार्य आदरणीय डॉक्टर अंत्रोळीकर हे करत होते ते आमच्या वडिलांचे गुरु. त्यानी मला सांगितले होते की तारकेश्वरी सिन्हा यांच्याबरोबर तू दिवसभर राहायचे. आज मला त्याची हळहळ वाटते. केवढ्या मोठ्या बाई माझ्याबरोबर होत्या आणि मी त्यांचा काहीच लाभ घेतला नाही हे आज आत्ता जाणवलं – – – – – आयुष्यात कुठल्या गोष्टीचा कधी पत्ता लागेल काही सांगता येत नाही…!

© सुश्री शीला पतकी

माजी मुख्याध्यापिका सेवासदन प्रशाला सोलापूर 

मो 8805850279

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ मनाचे श्लोक – एक सार्वकालिक ‘मनोपनिषद’… – श्लोक ३३ आणि ३४ ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्री विश्वास देशपांडे

? इंद्रधनुष्य ?

☆ मनाचे श्लोक – एक सार्वकालिक ‘मनोपनिषद’… – श्लोक ३३ आणि ३४ ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्लोक क्र. ३३ – – – – 

वसे मेरूमांदार हे सृष्टिलीळा|

शशी सूर्य तारांगणे मेघमाला|

चिरंजीव केले जनी दास दोन्ही |

नुपेक्षी कदा राम दासाभिमानी|३३|अर्थ : ही सृष्टी म्हणजे भगवंताची लीला आहे. त्यासृष्टीत मेरूमांदार आदी पर्वत आहेत. चंद्र, सूर्य आणि तारांगणे आहेत. मेघमाला आहेत. ही सृष्टी आहे तोपर्यंत हनुमान आणि बिभीषण दोन्ही चिरंजीव आहेत. प्रभू रामचंद्रांनी आपल्या या दोन्ही दासांना चिरंजीव केले आहे. दासाभिमानी असलेला भगवंत आपल्या भक्तांची कधीही उपेक्षा करीत नाही.

(मेरू – स्वर्ग, मत्यू, पाताळ यांना आधारभूत असलेला सोन्याचा पर्वत. मांदार – समुद्रमंथनाचे वेळी या पर्वताचा रवी म्हणून वापर केला गेला)

विवेचन : समर्थांनी आपल्याला मागील श्लोकात भगवंताच्या पराक्रमाचे आणि गुणांचे वर्णन करून सांगितले आहे या श्लोकात ते आपल्याला सांगतात की आपल्याला ही जी सृष्टी दिसते आहे ती म्हणजे केवळ भगवंताची लीला मात्र आहे. मेरू आणि मांदार हे दोन्ही पर्वत, चंद्र, सूर्य, अगणित तारे आणि तारका, असंख्य अशा आकाशमाला, बरसणारे ढग या सगळ्या गोष्टी परमेश्वराने निर्माण केल्या आहेत.

मेरू पर्वत, ज्याला सुमेरू असेही म्हटले जाते, एक पौराणिक पर्वत असून हिमालयात स्थित आहे असे मानले जाते. हा पर्वत म्हणजे हिंदू, जैन आणि बौद्ध धर्मांचे एक पवित्र स्थान समजले जाते. त्याचप्रमाणे हा पृथ्वीच्या उत्तर ध्रुवावर स्थित असून पृथ्वीची नाभी समजला जातो. हा पर्वत सुवर्णप्रमाणे चमकतो.

मांदार पर्वताचा उल्लेख देखील पौराणिक कथांमध्ये येतो. हा पर्वत बिहारच्या बांका जिल्ह्यात असून त्याची उंची सुमारे ७०० फूट आहे. पौराणिक कथेनुसार, समुद्रमंथनादरम्यान देव-दानवांनी अमृत मिळवण्यासाठी वासुकी नागासह या पर्वताला रवीसारखे वापरले होते। हे हिंदू आणि जैन धर्मातील एक महत्त्वाचे तीर्थक्षेत्र मानले जाते. या अद्भुत पर्वतांसारख्या अनेक अद्भुत आणि आश्चर्यकारक गोष्टी परमेश्वराने निर्माण केल्या आहेत.

थोडक्यात सांगायचे तर आपल्याला दिसणाऱ्या या अवघ्या विश्वाचा निर्माता भगवंत आहे. या सृष्टीमध्ये सजीवांसाठी आवश्यक असलेल्या हवा, पाणी, अन्न यासारख्या गोष्टी त्यानेच निर्माण केल्या आहेत. त्याची निर्मिती असलेले चंद्र आणि सूर्य आपल्याला प्रकाश देतात. नद्या आपली तहान भागवतात. मेघातून बरसणारा पाऊस आपल्यासाठी अन्न निर्माण करतो. या सगळ्या गोष्टी म्हणजे त्या परमेश्वराचीच निर्मिती आहेत.

जोपर्यंत ही सृष्टी अस्तित्वात आहे तोपर्यंत तारे, चंद्र, सूर्य आपल्याला प्रकाश देत राहतील. मेघ जलाचा वर्षाव करत राहतील ही भूमाता आपल्यासाठी अन्न निर्मिती करील. शतकानुशतके युगानुयुगे या गोष्टी होत आल्या आहेत आणि होत राहतील. परंतु या सृष्टीवर मानवासहित जे सर्व सजीव प्राणी, वनस्पती जन्माला आले आहेत ते सर्व मर्त्य आहेत. त्यांना मृत्यू अटळ आहे.

जिवासवें जन्मे मृत्यू, जोड जन्मजात

दिसे भासतें तें सारें विश्व नाशवंत

या गीतरामायणातील ओळी मानवी जन्म आणि मृत्यू हे कसे एकमेकांशी निगडित आहेत हे सांगतात.

या जगात जो जन्माला आला त्याला एक दिवस मृत्यू आहेच हे निश्चित पण असे असले तरी भगवंताने आपल्या दोन दासांना चिरंजीवित्व प्राप्त करून दिले. या जगामध्ये सात व्यक्ती चिरंजीव आहेत असे मानले जाते.

अश्वत्थामा बलिर्व्यासो हनुमानश्च विभीषणः।

कृपाः परशुरामश्च सप्तैते चिरंजिविनः॥

अश्वत्थामा, बळीराजा, वेद व्यास, हनुमान, बिभीषण, कृपाचार्य आणि परशुराम हे ते सप्त चिरंजीव. यातील हनुमान आणि बिभीषण हे दोघे निस्सीम श्रीरामांचे भक्त आहेत. हनुमंताचा जन्म वानर कुळातील तर बिभीषण राक्षस कुळात जन्मलेला. हनुमंत श्रीरामांचा निष्ठावान सेवक आहे हे आपण जाणतो. बिभीषणाची गोष्ट मात्र जरा वेगळी आहे. त्याचा जन्म राक्षस कुळात झालेला आणि महापराक्रमी रावणाचा तो सख्खा भाऊ. अन्यायी अशा रावणाची साथ सोडून श्रीरामांच्या पक्षात येणे ही गोष्ट त्याच्यासाठी एवढी सोपी नव्हती. परंतु तरी देखील त्याची रामावर असणारी श्रद्धा एवढी प्रचंड होती की तो हा सगळा विरोध सहन करून श्रीरामांना शरण आला. रामाने रावणाचा वध केल्यानंतर श्रीरामांनी लंकेचा राजा व्हावे अशीही इच्छा बिभीषणाने व्यक्त केली होती. एवढा तो रामभक्त होता.

हनुमंत आणि बिभीषण या दोघांचेही स्वभाव आणि कर्म वेगवेगळे होते. परंतु या दोघांमध्ये एक गोष्ट मात्र समान होती. ती म्हणजे ते दोघेही श्रीरामांचे परमभक्त होते. त्यांच्या अपार भक्तीमुळे श्रीरामांनी त्यांना चिरंजीव केले. जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून त्यांची सुटका केली. या मृत्यू लोकात जन्म घेऊनही ते अमर झाले ही फक्त श्रीरामंचीच कृपा!

खरी निष्ठा आणि भक्ती कशी असते आणि अशा भक्तांवर प्रभू श्रीराम कशी कृपा करतात हे या उदाहरणातून समर्थांनी आपल्या निदर्शनास आणून दिली आहे. आणि म्हणून ते पुन्हा आपल्याला सांगत आहेत की श्रीराम हे दासाभिमानी आहेत. आपल्या भक्ताची ते कधीही उपेक्षा करीत नाहीत.

स्वसंवाद : 

१) हनुमान आणि बिभीषण यांच्या इतकी भगवंताची भक्ती कदाचित मला जमणार नाही. परंतु किमान त्या मार्गावर चालावे असे तरी मला वाटते का?

२) ही सृष्टी भगवंताची लीला आहे असे मी मानतो का?

३) निसर्गाच्या विशालतेकडे पाहताना माझ्या मनात परमेश्वराप्रती कृतज्ञता येते का की मी ते गृहीत धरतो?

४) चिरंजीव होणे म्हणजे जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून मुक्ती. माझ्या भक्तीचे ध्येय केवळ सांसारिक सुखापुरते आहे की मोक्षापर्यंत पोहोचण्याची माझी खरी इच्छा आहे?

– – – –

श्लोक क्र. ३४ – – – 

उपेक्षा कदा रामरुपी असेना|

जिवा मानवां निश्चयो तो वसेना|

शिरी भार वाहेन बोले पुराणी |

नुपेक्षी कदा राम दासाभिमानी|३४|

अर्थ : आतापर्यंतच्या उदाहरणांवरून समर्थांनी आपल्याला हे पटवून देण्याचा प्रयत्न केला आहे की) भगवंत आपल्या भक्ताची कधीही उपेक्षा करीत नाही. परंतु (आपण असे दुर्दैवी जीव आहोत की) त्याची भक्ती करण्याचा आपला निश्चयच होत नाही. भक्तांची सारी काळजी मी वाहतो असे पुराणात त्याने वचन दिले आहे. दासाभिमानी असलेला श्रीराम आपल्या दासांची म्हणजेच भक्तांची कधीही उपेक्षा करीत नाही.

(रामरुपी – भगवंताजवळ, जिवां मानवां – जीवरूपी म्हणजेच सामान्य माणसाला)

विवेचन : आपल्या भक्ताची भगवंत कधीच उपेक्षा करीत नाही. त्याचा संपूर्ण भार तो वाहतो. हिरण्यकश्यपूचा मुलगा प्रल्हाद हा विष्णूचा भक्त होता. परंतु त्याच्या पित्याला त्याची विष्णूभक्ती मान्य नव्हती. तो देवांना आपले शत्रू मानत असे. विष्णू भक्ती करू नये म्हणून सुरुवातीला त्याने प्रल्हादाला समजावून पाहिले. परंतु तो जेव्हा ऐकत नाही असे दिसले तेव्हा त्याने विविध प्रकारे प्रल्हादाला ठार मारण्याचे प्रयत्न केले. परंतु सर्व प्रसंगांमध्ये भगवान विष्णूंनी त्याचे रक्षण केले. शेवटी नरसिंह रूपात प्रकट होऊन श्रीविष्णूंनी अत्याचारी अशा हिरण्यकश्यपूचा वध केला आणि अशा रीतीने आपल्या भक्ताचे संरक्षण केले.

आपल्या प्रजेला परमेश्वराचे नाव घेण्यास आणि ऋषीमुनींना यज्ञ करण्यास कंसाने बंदी घातली होती. त्याने ईश्वर भक्तांचा अनन्वित छळ केला. परंतु भगवंताने श्रीकृष्ण अवतारात या अन्यायी आणि दुराचारी कंसाचा वध करून प्रजेला त्याच्या छळातून मुक्त केले.

अशा विविध प्रकारे भगवंत आपल्या भक्तांचे रक्षण करण्यासाठी तत्पर असतो. त्यांचा भार किंवा काळजी तो आपल्या शिरावर घेतो अशी अनेक उदाहरणे पुराणांमध्ये आहेत.

परित्राणाय साधूनां विनाशायच दुष्कृताम्।

धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे ॥

असे वचन त्याने गीतेत आपल्याला दिले आहेच. असे असले तरी आपल्यासारख्या सामान्य माणसाला भगवंत आपल्याला सहाय्य करीलच याची खात्री वाटत नाही. याची दोन कारणे असू शकतात. पहिले म्हणजे परमेश्वर अस्तित्वात आहे आणि तो सदैव आपल्याजवळ आहे याची खात्री आपल्याला असत नाही. आपल्या हाकेला तो धावून येईलच याबद्दलही आपण साशंक असतो. त्याच्यावर भार टाकून निर्धास्त राहण्याइतकी निष्ठा किंवा समर्पण आपले नसते.

आपली अशी अपेक्षा असते की भगवंताने आपल्याला प्रपंचात येणाऱ्या अडचणींमध्ये आणि दुःखामध्ये मदत करावी. अशा गोष्टींसाठी आपण भगवंताला गृहीत धरतो. तो प्रसन्न व्हावा म्हणून निरनिराळ्या प्रकारचे नवस करतो, प्रार्थना करतो. भगवंताला निरनिराळ्या प्रकारे लाच देण्याचा प्रयत्न करतो. कधी त्याला कोणी भक्त मोठी देणगी देतो तर कधी कोणी सोन्याचा मुकुट अर्पण करतो. परंतु या गोष्टींची भगवंताला अपेक्षा नसते. त्याला अपेक्षा असते ती शुद्ध आणि निरपेक्ष भक्तीची!

आपण परमेश्वराची भक्ती करायला सुरुवात केली की आपली अशी अपेक्षा असते की त्याने आपल्यावर कृपा करावी. आपल्या संकटात धावून यावे. परंतु जेव्हा आपल्याला तसे होताना दिसत नाही तेव्हा आपला त्याच्यावरील विश्वास डळमळीत होताना दिसू लागतो. परंतु ही परमेश्वराने पाहिलेली आपली परीक्षा असते असे म्हणावे लागेल.

जो भगवंत आनंदनिधान आहे, कल्पतरू आहे अशा भगवंताकडे भक्ती, मुक्ती आणि मोक्ष मागण्या ऐवजी त्याच्याकडून आपण पैसा, व्यवहारातील यश, सुखाचा प्रपंच यासारख्या क्षुल्लक गोष्टींची अपेक्षा करत असतो. व्यवहारातील यश, पैसा, सुखसमृद्धी या गोष्टींनाच सामान्य माणसे परमेश्वराची आपल्यावर कृपा आहे असे समजतात. परंतु सदाचार आणि सद्बुद्धी ज्याच्याकडे आहे त्याच्यावर परमेश्वराची कृपा आहे असे समजावे.

भगवंताने गीतेमध्ये म्हटले आहे की “योगक्षेमं वहम्याहं. ” भगवंत आपला भार घेतो. त्याला आपली काळजी आहे. या त्याच्या वचनाचा अर्थ आपण असा घेता कामा नये की आपण आपले जे कर्तव्य आहे ते सोडून केवळ त्याच्यावर भार टाकून निवांत बसावे. अर्जुनाला आपल्या कर्तव्याची जाणीव करून देण्यासाठीच तर त्याने गीता सांगितली. आपल्या पूर्ण क्षमतेने आपले कर्तव्य करावे, स्वधर्म पार पाडावा. परंतु असे करताना त्याचे विस्मरण होऊ देऊ नये. संत जनाबाई म्हणतात 

दळीता कांडीता तुज गाईन अनंता |

न विसंबे क्षणभरी | तुझे नाम गा मुरारी

– असेच आपणही आपले कर्तव्य करत असताना त्याच्या नामात मग्न राहावे.

स्वसंवाद : 

१) मी भगवंताची भक्ती करतो तेव्हा माझ्या मनात काय असते – निरपेक्ष प्रेम की एखादी अपेक्षा?

२) परमेश्वराप्रती असलेली माझी भक्ती खरोखर निरपेक्ष असून ती “लाच” तर नाही ना?

३) संकटात भगवंताची कृपा दिसली नाही तेव्हा माझी श्रद्धा डळमळीत होते का?

४) “योगक्षेमं वहाम्यहं” हे वचन मला माहीत आहे – परंतु माझे कर्तव्य करताना मी खरोखर त्याच्यावर भार सोपवतो का की प्रपंचाची काळजी मीच वाहत राहतो?

– क्रमशः श्लोक ३३ आणि ३४.

© श्री विश्वास देशपांडे

चाळीसगाव

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ‘बलोच मराठा!’ – लेखक : श्री सचिन जवळकोटे ☆ प्रस्तुती – सुलू साबणे जोशी ☆

सुलू साबणे जोशी

? इंद्रधनुष्य ?

☆ ‘बलोच मराठा!’ – लेखक : श्री सचिन जवळकोटे ☆ प्रस्तुती – सुलू साबणे जोशी ☆

पाकिस्तानात हळदीचा कार्यक्रम अन् पुरणपोळीचा बेत..

‘धुरंधर’मुळं ‘बलुचिस्तान’ जगाच्या नजरेत आलेलं. ‘बलोच’ शब्दाचं सर्चिंग शतपटीनं सोशल मीडियावर वाढलेलं. मात्र, हेच बलुचिस्तानी गेल्या अडीचशे वर्षांपासून शोध घेताहेत आपल्याच मावळ प्रांताचा.. कारण तीन लाखांहून अधिक लोकसंख्या असलेल्या मोठ्या समूहाला पाकिस्तानात ओळखलं जातं ‘बलोच मराठा’ म्हणून. होय. अनोख्या इतिहासाची ही विचित्र वाटचाल डोळे विस्फारून टाकणारी.

‘धुरंधर’मध्ये अक्षय खन्नाचा ‘रहमान डकैत’ मूळ बलुचिस्तानातला दाखवलेला. कारच्या बॉम्बस्फोटात मरण्यापूर्वी संजय दत्तचा ‘एसपी अस्लम चौधरी’ फोनवर ‘ए बलोचऽऽ’ म्हणून दम देताना दिसलेला. यामुळं भारतीयांमध्ये पाकिस्तानच्या बलुचिस्तानबद्दल उत्सुकता वाढलेली. त्याचवेळी त्या प्रांतातल्या हजारो नागरिकांनीही या चित्रपटाच्या छोट्या -मोठ्या रिल्सवर कौतुकानं कॉमेंट देण्यास सुरुवात केलेली. यात सर्वाधिक संख्या ‘बलोच मराठा’ नावाची असलेली, कारण त्या मंडळींना ‘बॉलिवूड’बद्दल प्रचंड आकर्षण असलेलं. यातूनच आपल्या पूर्वजांचा शोध घेण्याची धडपड स्पष्टपणे दिसून आलेली. या साऱ्याचं मूळ तब्बल दोनशे पासष्ट वर्षांपूर्वीच्या कहाणीत असल्याचं लक्षात आलेलं.

सन १७६१ साली ‘पानिपत’च्या युद्धानंतर ‘अब्दाली’ खजिन्याविनाच रिकाम्या हाती अफगाण प्रांतात परतला. त्याला युद्धात सैनिकांची मदत करणाऱ्या मीर नासीरखानला मोबदल्यापोटी त्यानं ‘बंदी दुश्मन’ सैनिकांना बलुचिस्तानात सोडलं. तेव्हा ती संख्या होती जवळपास वीस हजार. तेव्हापासून ते तिथंच राहिले. यातले बहुतांश मूळचे मावळ प्रांतातले. सुपीक-सधन मातीतले. त्यामुळं तिथं ओसाड वाळवंटात जगण्यासाठी त्यांना निसर्गाशी लढावं लागलं. आपलं अस्तित्व टिकविण्यासाठी तिथल्या राज्यकर्त्यांशीही संघर्ष करावा लागला. काळाच्या ओघात त्यांची ‘भाषा’ बदलली. ‘वेश अन् देश’ बदलला. ‘संस्कृती’ही बदलली. परंतु, आपल्या मूळच्या ‘चालीरिती’ मात्र त्यांनी हरवू नाही दिल्या. ‘बुगती’ अन् ‘मरारी’ जमातीचा भाग असलेले हे लोक आजही स्वत:ला ‘बलोच मराठा’ म्हणवून घेतात. सातारा राजधानीचे छत्रपती थोरले शाहू महाराज यांच्या नावानं ‘साहू मराठा’ अशी उपाधी हे ‘बुगती मराठे’ लावतात. पेशव्यांच्या संदर्भातूनही बरेच ‘पेशवानी‘ नावानं ओळखले जातात.

इराण, पाकिस्तान अन् अफगाणिस्तान सीमेवर आता त्यांची दहावी-अकरावी पिढी जन्माला आलेली. तरीही यांच्यात लग्नावेळी ‘हळदीचा कार्यक्रम’ रंगतो. आजही ‘तांदळाचं माप’ ओलांडूनच वधू-वराचा घरात प्रवेश होतो. अधून-मधून पुरणपोळीही करतात. सैन्यदलात नोकरी, शेती अन् व्यापार हे पोट भरण्याचं माध्यम. यातील बरेच उच्चशिक्षित आता पाकिस्तानच्या सरकारी अधिकारीपदीही कार्यरत. सोशल मीडियावर ‘मराठा ट्राईब’ नावाचा यांचा मोठा ग्रुप सक्रिय. यातील अनेक बलोच सदस्यांनी स्वत:च्या नावापुढं मोठ्या अभिमानानं ‘मराठा’ शब्द मिरवलेला. हा ग्रुप तयार करताना त्यांनी सुरुवातीला ‘मराठा’ शब्द टाईप केलेला. नंतर ‘मरहट्टा’ असा बदल केलेला. पुन्हा मूळ ‘मराठा’ शब्द वापरलेला. त्यामुळं ‘आपण मूळचे कोण आहोत’, हे त्यांना पिढ्यानपिढ्या माहीत असलं तरी ‘आपली नेमकी ओळख काय? ’ या गूढ प्रश्नाचा गुंता त्यांच्यासाठी अद्याप न सुटलेला.

तोंडात बलुची.. कानात मराठी – – – 

बलुचिस्तानातल्या ‘मराठा’ समुहाचा आजपावेतो कैक संदर्भग्रंथात उल्लेख आलेला. कैक कादंबऱ्यांची पानंही रंगलेली. यावर ‘बलोच’ नावाचा मराठी चित्रपटही निघालेला. याचे पटकथा-दिग्दर्शक प्रकाश पवार यांनी जेव्हा या नावाची घोषणा केली, तेव्हा सर्वाधिक तिकडच्याच मंडळींनी सोशल मीडियावर उदंड प्रतिसाद दिलेला. मात्र, त्यांना मराठी समजत नसल्यानं गोंधळ उडालेला. एका ‘बलुची’नं ‘यूट्यूब’वर विचारलेलं, ‘इस मुव्ही का नाम क्या? ’ तेव्हा महाराष्ट्रातल्या एकानं त्याची खिल्ली उडविली, ‘वाचल्याशिवाय कॉमेंट करतोय.. बेटे मौज कर दी. ‘ परंतु या बिच्चाऱ्याला काय माहीत की, विचारणारा उर्दू भाषिक. थेट इराण-अफगाणिस्तान बाँड्रीवरचा. तरीही पाकिस्तानातल्या त्या लोकांनी मोबाईलवर हा चित्रपट आवडीनं पाहिला. तोंडातली भाषा बलुची असली तरीही कानावर पडलेली मराठी कदाचित आपलीशी वाटलेली. योगायोगाची गोष्ट म्हणजे या चित्रपटाच्या नायिका स्मिता गोंदकर यांची कुलदेवताही थेट तिकडचीच. बलुचिस्तानातली हिंगलाज माता.

हिंगलाज देवी ते गडहिंग्लज!

पाकिस्तानातील ‘हिंगलाज देवी’चा इतिहास दोन हजार वर्षांपूर्वीचा. एकीकडे अरबी समुद्र, तर दुसरीकडे बलुचिस्तानातल्या हिंगोल नदीचं खोरं. किर्थर पर्वतरांगेतील दुर्गम गुहेत पुरातन मंदिर वसलेलं. इथंच स्थायिक झालेला ‘मराठा’ समुदाय दरवर्षी ‘नानी’ यात्रेत मोठ्या श्रद्धेनं सामील होत असलेला. याच हिंगलाज देवीच्या अनेक उपशाखा महाराष्ट्रात. अमरावतीत मोठं मंदिर. सोलापुरातही हिंगलाबिका नावानं सुप्रसिद्ध. कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज गावाचं नावही तिच्यामुळेच पडलेलं. तिकडून आलेल्या बलुची हिंग व्यापाऱ्यांनी इथं पूर्वी देवीची प्रतिष्ठापना केल्याचं मानलं गेलेलं. लगतचा सामानगड किल्ला अन् हिंगलाज मंदिर यावरून ‘गडहिंग्लज’ नाव पडल्याची आख्यायिका.

थेट साताऱ्याशी नाळ..

‘धुरंधर’मध्ये रणवीरसिंगने रंगवलेला ‘हमजा’ पाहून अनेकांना कुलभूषण जाधव यांची प्रकर्षानं आठवण झालेली. त्यांना २०१६ साली भारतीय एजंट असल्याच्या आरोपाखाली पाकिस्ताननं अटक केलेली. यातही दोन गोष्टी किती नवलाच्या बघा. पहिली म्हणजे जाधव हे मूळचे साताऱ्याचे. आनेवाडीत त्यांचं जुनं घर. दुसरी म्हणजे त्यांना पाकिस्तानी पोलिसांनी पकडलं बलुचिस्तानातच. तिथल्या तरुणांना भडकवल्याचा आरोप त्यांच्यावर. म्हणजे २६५ वर्षांनंतरही मराठा माणूस अन् बलुचिस्तान यांचा संबंध काही तुटता तुटेनासा झालेला. विशेष म्हणजे ‘बलाेच’ चित्रपटाचे दिग्दर्शक पवार हेही साताऱ्यातील कुडाळचेच. राहता राहिला विषय शौर्याचा. ‘धुरंधर’मध्ये ‘एसपी चौधरी’ला उडविणाऱ्या बलुची तरुणाचा प्लॅन अत्यंत चक्रावून टाकणारा.

– – – आलं का लक्षात? स्वतंत्र देशाच्या मागणीसाठी बलुचिस्तानातल्या या समूहाला आजही पाकिस्तान सरकार का टरकून असतं ते. होय. हाच तो डीएनए. ‘स्वराज्य’साठी लढणाऱ्या ‘गनिमी कावा’चा. लगाव बत्ती..

लेखक : सचिन जवळकोटे

कोल्हापूर.

प्रस्तुती : सुलू साबणे जोशी 

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ मनाचे श्लोक – एक सार्वकालिक ‘मनोपनिषद’… – श्लोक ३१ आणि ३२ ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्री विश्वास देशपांडे

? इंद्रधनुष्य ?

☆ मनाचे श्लोक – एक सार्वकालिक ‘मनोपनिषद’… – श्लोक ३१ आणि ३२ ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्लोक क्र. ३१ – – – 

महा संकटी सोडिले देव जेणे|

प्रतापे बळें आगळा सर्वगूणें|

जयाते स्मरे शैलजा शूलपाणी|

नुपेक्षी कदा राम दासाभिमानी|३१|

अर्थ : सर्व देवांवर जेव्हा अत्यंत कठीण संकट आले तेव्हा प्रभू रामचंद्राने त्यांना त्यातून सोडवले. असा तो श्रीराम पराक्रमाने, बळाने आणि सर्व गुणांनी संपन्न आहे. प्रत्यक्ष भगवान शंकर आणि पार्वती त्याचे स्मरण करतात. असा हा दासाभिमानी असलेला भगवंत आपल्या दासाची म्हणजेच भक्ताची कधीही उपेक्षा करीत नाही.

विवेचन मागील श्लोकात भगवंताचे सेवक असलेल्या व्यक्तीकडे वक्रदृष्टीने पाहण्याची कोणाची हिंमत नाही असे समर्थांनी सांगितले आहे. या श्लोकात तो भगवंत कसा श्रेष्ठ आहे ते सांगताना त्याच्या गुणांचे किंवा चरित्राचे गुणवर्णन समर्थ करतात.

रावण हा महापराक्रमी होता परंतु आपल्या सामर्थ्याचा त्याने दुरुपयोग केला आपल्या सामर्थ्याच्या बळावर त्याने देवांनाही बंदिवान केले. हे म्हणजे देवांवर आलेले मोठे संकट होते. श्रीरामांनी रावणाशी युद्ध करून सीतेची सुटका केली, अनितीने वागणाऱ्या रावणाचा वध केला आणि त्याच्या बंदीवासात असलेल्या देवांना मुक्त केले. असा हा राम महाप्रतापी आणि महाबलशाली आहे.

समर्थ रामाचे वर्णन करताना म्हणतात, ” आगळा सर्वगुणें… “म्हणजे भगवंत सर्व गुणसंपन्न तर आहेच परंतु अनेक परस्परविरोधी गुण त्याच्या व्यक्तिमत्वात एकवटले आहेत. तो जसा महापराक्रमी आणि शूरवीर आहे, त्याचवेळी तो भक्तवत्सल आहे. शबरीची उष्टी बोरे प्रेमाने खाणारा आहे, आपला भक्त असलेल्या पुंडलिकासाठी युगानुयुगे वीटेवर उभा राहणारा आहे, जनाबाईला दळण दळू लागणारा आहे, नाथांघरचे पाणी भरणारा आहे. अशी त्याची किती रूपे वर्णावी!

त्याचप्रमाणे देवांवर जेव्हा संकट आले त्या त्यावेळी विष्णूने अवतार धारण करून देवांचे रक्षण केले आहे. पुराणातून अशा प्रकारच्या कथा आपण नेहमीच वाचतो. जेव्हा जेव्हा देवांवर संकट येत असे तेव्हा तेव्हा सर्व देव इंद्राच्या नेतृत्वाखाली श्रीविष्णूकडे आश्रय मागण्यासाठी जात असत आणि मग तो वेगवेगळे अवतार धारण करून त्यांचे रक्षण करीत असे.

विष्णू हा जगाचा पालन कर्ता आहे. ब्रह्मदेव हा जन्म देणारा आहे आणि भगवान शिव संहार करणारा आहे. पालन करणारा हा नेहमी जन्म देणाऱ्या आणि संहार करणाऱ्या पेक्षाही श्रेष्ठ असतो. यशोदेने श्रीकृष्णाचे पालनपोषण केले, त्याच्यावर संस्कार केले म्हणून जन्म देणाऱ्या देवकीपेक्षा श्रीकृष्णाची माता म्हणून यशोदेला आधी मान मिळतो. मुलांना जन्म देणे सोपे असते परंतु पालक होणे मात्र कठीण! काही लोक मुलांना जन्म देऊन सोडून देतात परंतु जे लोक अशा अनाथ मुलांना आई-वडिलांची माया देतात, त्यांचे पालनपोषण करतात ते माता पिता श्रेष्ठ होत. कुंतीने कर्णाला जन्म देऊन सोडून दिले परंतु धृतराष्ट्राचा सारथी असलेल्या अधिरथ आणि त्याची पत्नी राधा यांनी कर्णाचा सांभाळ मोठ्या प्रेमाने केला. म्हणूनच तो राधेय म्हणून ओळखला जातो.

अशाप्रकारे संपूर्ण जगाचे पालनपषण करणारे श्रीविष्णू किंवा श्रीराम श्रेष्ठ आहेत. प्रत्यक्ष पार्वती म्हणजे शैलजा आणि शूलपाणी म्हणजे भगवान शंकर हे देखील त्याचे स्मरण करतात एवढा तो श्रेष्ठ आहे. रामनामाचा महिमा प्रत्यक्ष शंकर पार्वतीला वर्णन करून सांगतात. तेव्हा महापराक्रमी, महाबलशाली आणि सर्व गुणांनी संपन्न असलेला हा भगवंत आपल्या दासाची कधीही उपेक्षा करीत नाही. हे लक्षात घेऊन आपणही त्याचेच स्मरण नित्य केले पाहिजे.

स्वसंवाद : 

१) देवांनाही संकटे येतात आणि ते परमेश्वराचा आश्रय घेतात मग मी माझ्या संकटात त्याचा आश्रय घेण्यास का संकोचतो?

२) पालनकर्ता हा जन्म देणाऱ्यापेक्षा श्रेष्ठ असतो मग माझे खरे पालन करणारा कोण आहे हे मी ओळखले आहे का?

३) प्रत्यक्ष शंकर-पार्वती रामाचे स्मरण करतात. माझ्या दिनक्रमात त्याचे स्मरण कितीपत होते?

४) भगवंत “आगळा सर्वगुणें” आहे. माझ्या जीवनात मी कोणत्या गुणांचा आदर्श त्याच्याकडून घेतो आहे?

– – – – 

श्लोक करा. ३२ – – – 

अहिल्या शिळा राघवे मुक्त केली

पदी लागता दिव्य होऊन गेली |

जया वर्णिता शीणली वेदवाणी |

नुपेक्षी कदा राम दासाभिमानी |३२|

अर्थ : श्रीरामांच्या पदाचा स्पर्श होताच शिळा झालेली शापित अहिल्या मुक्त झाली. त्यांच्या पदस्पर्शाने तिचा उद्धार झाला. अशा या भगवंताचे वर्णन करताना वेद सुद्धा शीणले आहेत म्हणजे थकले आहेत किंवा त्याचे वर्णन ते करू शकत नाहीत. असा हा अहिल्येचा उद्धार करणारा भगवंत आपला देखील उद्धार केल्याशिवाय राहणार नाही.

विवेचन : या श्लोकांमध्ये समर्थ भगवंताच्या पराक्रमाचे आणि गुणांचे वर्णन करत आहेत आणि आपल्या भक्तांना तो कशाप्रकारे तारतो हेच यातून आपल्या मनावर ठसवत आहेत. आधीच्या श्लोकामध्ये भगवान रामाने रावणाच्या बंदिवासात असलेल्या देवांना मुक्त केले असे समर्थांनी सांगितले. या श्लोकात श्रीरामांच्या पदस्पर्शाने अहिल्येचा कसा उद्धार झाला ही गोष्ट ते आपल्याला सांगत आहेत.

अहिल्या ही गौतम ऋषींची पत्नी अत्यंत रुपवती आणि शीलवती होती तसेच ती महान साधवी आणि पतिव्रता होती इंद्र तिच्या सौंदर्यावर मोहित झाला आणि गौतम ऋषींचे रूप घेऊन त्यांच्या आश्रमात आला. परंतु काही कथांनुसार इंद्राने तिचे शीलभ्रष्ट करण्याआधीच अहिल्येने त्याला ओळखले आणि तो परत फिरला. तर काही कथांनुसार इंद्राच्या कृत्याला ती बळी पडली आणि तिचे पातिव्रत्य भंग झाले असे म्हटले जाते. याच सुमारास गौतम ऋषी आपल्या आश्रमात परत आले आणि त्यांना अहिल्येच्या पातिव्रत्यावर संशय आला आणि त्यांनी तिला तू शिळा होऊन पडशील असा शाप दिला. वास्तविक हे सगळे जे काही घडले यात अहिल्येचा काहीही दोष नव्हता.

खरंतर मूळ वाल्मिकी रामायणात गौतम ऋषींनी अहिल्येला शाप दिल्याची आणि ती शिळा होऊन पडल्याची नोंद नाही. तुलसी रामायणात आणि इतरही अनेक ठिकाणी मात्र ही कथा सांगितली गेली आहे.

समर्थांनी मूळ वाल्मिकी रामायणाचा बारकाईने अभ्यास केला होता. अशा प्रकारची घटना त्यात नाही हे माहीत असताना देखील ते या ठिकाणी त्या घटनेचा उल्लेख करतात. त्याचे कारण म्हणजे ही घटना सर्वांनी स्वीकारली आहे. दुसरी म्हणजे ती रामाची महती सांगणारी आहे. समर्थांचे आराध्य दैवत श्रीराम असल्यामुळे श्रीरामांची महती सांगणारी कोणतीही गोष्ट असेल तरी त्यांना ती मान्य होते.

श्रीराम हे पतितांना पावन करणारे होते. अहिल्येला इतरांनी जरी शीलभ्रष्ट मानले तरी श्रीरामांनी तिचा तिरस्कार कधी केला नाही. आणि तिला आपल्या पदस्पर्शाने पावन करून तिचा उद्धार केला. या साध्वीचे नाव अत्यंत आदराने पाच पतिव्रतांमध्ये घेतले जाते.

अहिल्या द्रौपदी सीता तारा मंदोदरी तथा 

पंचकन्यां स्मरे नित्यं महापातकनाशनं 

तेव्हा जो भगवंत शिळा झालेल्या अहिल्येचा उद्धार करतो, तो आपला सुद्धा उद्धार करेल हा विश्वास समर्थ आपल्याला या ठिकाणी देतात. पतितांना पावन करणारा असा हा भगवंत आहे त्याच्या पराक्रमाचे आणि गुणांचे वर्णन करण्यासाठी वेद सुद्धा कमी पडतात. त्याचे गुण वर्णन करताना ते थकतात. अशा या परमेश्वराची भक्ती जर आपण मनापासून केली तर तो आपलाही उद्धार केल्याशिवाय राहणार नाही अशी ग्वाही या ठिकाणी समर्थ आपल्याला देतात. म्हणून प्रत्येकाने एकाग्रतेने आणि मनापासून श्रीरामांची भक्ती करावी. मग तो आपल्याबरोबर प्रत्येक प्रसंगी सोबत राहील. संत तुकारामांना असा अनुभव आला होता म्हणूनच ते ” जेथे जातो तेथे तू माझा सांगाती असं म्हणतात. “

स्वसंवाद ::

१) अहिल्येचा दोष नसताना तिला शाप मिळाला. माझा दोष नसताना माझ्या आयुष्यातही असे अन्यायकारक प्रसंग आले तर माझी परमेश्वरावरील श्रद्धा टिकून राहते का?

२) श्रीरामांनी इतरांनी तिरस्कारलेल्या अहिल्येचा स्वीकार केला. मी माझ्या जीवनात अशा उपेक्षित व्यक्तींशी कसा वागतो?

३) “जेथे जातो तेथे तू माझा सांगाती” अशी माझ्या दैनंदिन व्यवहारात मला भगवंताची सोबत जाणवते का 

– क्रमशः श्लोक ३१ आणि ३२.

© श्री विश्वास देशपांडे

चाळीसगाव

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares