मराठी साहित्य – विविधा ☆ आनंदनिधान- – -☆ सुश्री विभावरी कुलकर्णी ☆

सुश्री विभावरी कुलकर्णी

🔅 विविधा 🔅

☆ आनंदनिधान — ☆ सुश्री विभावरी कुलकर्णी 

आनंदनिधान‘ या शब्दाचा अर्थ अतिशय सुंदर आणि आध्यात्मिक आहे. हा शब्द प्रामुख्याने दोन शब्दांनी बनलेला आहे. आनंद आणि निधान.

याचा सविस्तर अर्थ –

​शब्दशः अर्थ ​आनंद, सुख, हर्ष किंवा प्रसन्नता.

​निधान म्हणजे साठा, ठेवा, खजिना किंवा आश्रयस्थान.

​त्यामुळे, ‘आनंदनिधान’ म्हणजे ‘आनंदाचा खजिना’ किंवा ‘ज्याच्याकडे आनंदाचा मोठा साठा आहे असा’.

​व्यावहारिक आणि आध्यात्मिक अर्थ –

​मराठी भाषेत आणि संतांच्या साहित्यात हा शब्द विशेषतः ईश्वर किंवा सद्गुरूंसाठी वापरला जातो.

​ईश्वराचे स्वरूप: ज्याच्याकडून फक्त आनंदच मिळतो आणि जो स्वतः आनंदाचे माहेरघर आहे, असा तो ‘आनंदनिधान’ (उदा. प्रभू रामचंद्र किंवा श्रीकृष्ण).

​पूर्णत्व: असा साठा जो कधीही संपत नाही. अक्षय आनंदाचा स्रोत.

​वाक्यात उपयोग करताना हा शब्द सहसा भक्तीगीतांमध्ये किंवा काव्यात एखाद्या व्यक्तीच्या अत्यंत प्रसन्न आणि मंगल स्वरूपाचे वर्णन करण्यासाठी वापरला जातो. प्रत्येक व्यक्तीचे आनंदनिधान वेगळे असते.

आज मला हा शब्द वाचला किंवा ऐकला की आठवते, माझी आजी! आजोबा आम्ही पाहिलेच नाहीत. आणि लहानपणी पासून आजी जशी बघितली आहे. तशीच ती शेवट पर्यंत होती. तिच्या अनंत आठवणी, सल्ले, प्रेम सगळे आठवते. पण तीचे एक विशेष कायम आठवते ते म्हणजे तीने शोधलेला तिचा आनंद!

तिची सकाळ व्हायची ती श्रीकृष्णाच्या नावानेच! जणू तो कृष्ण तिच्या जवळच आहे. डोळे उघडताना म्हणणार, “चला कृष्णा, किती वेळ झोपायचे? उठा आता. ” उठल्यावर स्वतःचे मुखमार्जन झाले की लगेच त्या कृष्णाच्या मूर्तीच्या तोंडावर पाण्याचा हात फिरवणार. छोट्या रुमालाने पुसणार. चहा घेताना तो कप प्रथम कृष्ण मुर्ती समोर ठेवणार नंतर स्वतः घेणार. पुन्हा पाण्याचे बोट त्या मूर्तीच्या ओठांवर फिरवणार. प्रत्येक वेळी कृष्ण तिच्या बरोबर असल्या प्रमाणे त्याच्याशी बोलणार. अंघोळीला जाताना, “चला किती वेळ पारोसे रहायचे? स्नानाला चल कृष्णा ” म्हणणार. हे सर्व करताना तिच्यासाठी कृष्ण लहान मुला प्रमाणे असायचा. स्वयंपाक करताना, “चला कृष्णामाई आज हे बनवू या. चल भाजी निवडायला बरं ” असे म्हणणार. त्यावेळी कृष्ण तिच्यासाठी तिची सखी असायचा. जेवताना, काम करताना, वाचन करताना प्रत्येक वेळी कृष्णाला साद घालून आपल्या सोबत ठेवणार. जिथे एकटी जायची तिथे काहीही केले की लगेच कृष्णार्पण म्हणणार. आम्ही लहान असताना तिला चिडवत असू. “आजी कचरा टाकताना कृष्णार्पण म्हणू नको. नाहीतर तो कचरा कृष्णाच्या डोक्यावर येईल. ” पण ती रागवायची नाही. ती म्हणायची, “जगाची सफाई तर तोच करतो. मनाची, कचऱ्याची, बुद्धीची सफाई करुन चांगले विचार तोच तर देतो. तुम्ही एवढे खेळता, बोलता, इतकी हुशारी चांगली बुद्धी तोच तर देतो. “

तिला कुठे एकटी जाऊ नको असे कोणी म्हणाले, की तीचे उत्तर ठरलेले असायचे. “मी कुठे एकटी आहे, तो आहे ना माझा रक्षक सखा माझ्या बरोबर!” अगदी रात्री झोपताना सुद्धा त्या कृष्णाला साद घातल्या शिवाय झोपणार नाही. त्याला विविध दागिने घालणे, विविध कपडे घालणे, सण असेल तेव्हा जरीचे कपडे घालणे, थंडी पडली की, लोकरीचे कपडे घालणे, झोपतांना पांघरूण घालणे. हे सगळे चालू असायचे. लहानपणी याचा अर्थ कळायचा नाही. आणि गंमत वाटायची. पण जसे समजू लागले तसे तीचे वागणे, बोलणे पटू लागले. तीने विविध रूपातील कृष्णाला आपल्या आयुष्याचा रक्षणकर्ता, सोबती या रूपात बघितले होते. त्याची भक्ती केली होती. आपली सुखदुःखे त्याच्या बरोबर वाटली होती. तीचे आनंदनिधान तीने या कृष्णात शोधले होते.

© सुश्री विभावरी कुलकर्णी

मेडिटेशन,हिलिंग मास्टर व समुपदेशक, संगितोपचारक.

सांगवी, पुणे

📱 – ८०८७८१०१९७

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ मला समजलेली संत तुकारामांची गाथा… भाग – ३… ☆ सुश्री अरुणा मुल्हेरकर ☆

सुश्री अरुणा मुल्हेरकर

? विविधा ?

☆ मला समजलेली संत तुकारामांची गाथा… भाग – ३ ☆ सुश्री अरुणा मुल्हेरकर ☆

तुकारामांचे मन प्रपंचात, संसारात मुळीच रमत नाही. पांडुरंगाच्या भेटीची त्यांना तळमळ लागून राहिली आहे, म्हणूनच ते एकसारखे म्हणतात,

भेटी लागी जीवा लागलीसे आस

पाही रात्रंदिस वाट तुझी

परमेश्वर प्राप्तीच्या वेडाने

कन्या सासुरासी जाये। मागे परतुनी पाहे।

तैसे झाले माझ्या जीवा ।केव्हा भेटसी केशवा।।

 

जीवना वेगळी मासोळी तैसा तुका तळमळी. ।

तुकारामांची अवस्था पाण्याबाहेर तडफडणाऱ्या मासोळी सारखी झाली आहे. पांडुरंगाची कृपादृष्टी मिळवण्यासाठी आता काय करावे हा एकच विचार त्यांच्या मनात रात्रंदिवस घोळत आहे.

ते पांडुरंगाला साद घालतात आणि म्हणतात,

तान्हेल्याची धनी फिटे गंगा नव्हे उणी।

माझे मनोरथसिद्धी पाव भावे कृपानिधी।।

तू तो उदारांचा राणा माझी अल्पशी ।

कृपादृष्टी पाहे तुका म्हणे होई साहे ।

एखाद्या तहानलेल्या माणसाने गंगेतले पाणी पिऊन त्याचे समाधान झाले, तरी गंगेचे पाणी काही कमी होत नाही. माणूस मात्र तृप्त होतो. त्याचप्रमाणे हे कृपेच्या सागरा माझ्या मनातल्या इच्छा, माझे सर्व मनोरथ तूच पूर्ण करू शकतोस.

तुम्ही माझ्याकडे कृपादृष्टीने पहावे एवढीच माझी अल्पशी इच्छा आहे. माझ्या साधनेत मला मदत करा.

भक्ती मार्ग हा परमेश्वरा प्रती जाण्याचा सर्वात सोपा मार्ग आहे. बहुतेक सर्व साधुसंत याच मार्गाने गेले आहेत, कारण या मार्गात कुठेही आड वळणे नाहीत. भक्ती मार्गाची ही वाट अगदी स्वच्छ आहे.

संत तुकारामही याच मार्गाने जात आहेत.

ते साधकांना सांगतात,

नव्हतो सावचित्त तेणे अंतरले हित।

पडिला नामाचा विसर वाढविला संसार।।

लटक्याचे पुरी गेलो वाहूनिया दूरी।

तुका म्हणे नाव आम्हा सापडला भाव।।

ते स्वतः विषयी सांगतात की हरी चिंतनाविषयी सावध नव्हतो, म्हणून विघ्ने आली. हरी नामाचा विसर पडला आणि संसार वाढवत बसलो. मायेच्या पुरात पुरता अडकलो. परंतु आता जागा झालो आहे. हरिभक्तीची नौका सापडली आहे.

तेव्हा आता काय उणे आम्हा विठोबाचे पायी

नाही ऐसे काही तेथे एक

तुका म्हणे मोक्ष विठोबाचे गावी

फुकाची लुटावी भांडारे ती

पांडुरंगाच्या गावाला मोक्षाची भांडारे भरलेली आहेत आणि भक्तांना ती अगदी मोफत आता लुटता येतात.

तुकाराम महाराज या मायामोहातून, प्रपंचातून मुक्त होऊन पांडुरंगाशी एकरूप होण्यासाठी पंढरीच्या पांडुरंगाच्या चरणावर माथा ठेवण्यासाठी आतुर झाले आहेत. अतिशय व्याकुळ झाले आहेत. ते म्हणतात, ” पांडुरंगा तू मला फक्त भेट दे”. त्यासाठी…

*नलगे हे तुझे ब्रह्मज्ञान। गोजिरे सगुण रूप पुरे।।

लागला उशिर।पतित पावन ।विसरूनी वचन। गेलास या।।*

जाळूनी संसार। बसला अंगणी ।तुझे नाही मनी ।मानसी हे।।

तुका म्हणे नको राग रागेजू विठ्ठला। उठी पावतात देई मला भेटी आता।।

या अभंगातूनही विठ्ठलाच्या भेटीची तुकाराम महाराजांना लागलेली तळमळच दिसून येते. या अभंगात वापरलेला रागेजू हा शब्द मला विशेष लक्षणीय वाटला. लहान मूल जसे लडिवाळपणे त्याच्या मातेकडे काही हट्ट करते, त्याचप्रमाणे तुकाराम महाराज या माऊलीला रागावू नकोस असे मोठ्या लडिवाळपणे सांगत आहेत.

संसारातून तुकाराम महाराजांना पूर्ण विरक्ती आलेली आहे. पंचेंद्रियांवर ताबा मिळवलेला आहे, आणि ते पांडुरंगाला म्हणतात,

संसार हा तीही केला पाठमोरा

नाही द्रव्यदारा जया चित्ती

शुभाशुभ नाही हर्षामर्श अंगी

जनार्दन जगी होऊनी ठेला

तुका म्हणे दिला देह एकसरे

जयासी दुसरे नाही मग

त्यांना आता मान मरातब काही नको. त्यात त्यांना थोडेही सुख वाटत नाही. गोड अन्न सुद्धा त्यांना विष समान वाटत आहे. कोणी त्यांची स्तुती केली तर त्यांचा जीव कासावीस होतो.

ते म्हणतात,

नको मृगजळा होऊ मज

तुका म्हणे आता करी माझे हित

काढावे जळत्या आगीतून.

हा संसार म्हणजे त्यांना जळती आग वाटत आहे.

तुकाराम महाराजांच्या प्रत्येक शब्दातून त्यांची विठ्ठल भक्तीची आणि विठ्ठलाच्या भेटीची तळमळ दिसून येते

विठ्ठला रे तू उदाराचा राशी

विठ्ठला तुझं पाशी सकळसिद्धी

विठ्ठला रे तुझे नाम बहु गोड

विठ्ठला तू पुरविशी सर्व कोड

विठ्ठला रे तुझे श्रीमुख चांगले

विठ्ठला रे सोस घेतला जीवे

विठ्ठला रे शोक करीत असे तुका

विठ्ठला तू एका झडकरी

संत तुकाराम हे पूर्णपणे विठ्ठलमय झालेले आहेत.

क्रमशः… ३ 

© सुश्री अरुणा मुल्हेरकर 

डेट्राॅईट (मिशिगन) यू.एस्.ए.

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ तो आणि मी…! – भाग ८७ ☆ श्री अरविंद लिमये ☆

श्री अरविंद लिमये

? विविधा ?

☆ तो आणि मी…! – भाग ८७ ☆ श्री अरविंद लिमये ☆

(पूर्वसूत्र- नाईकसरांचं फक्त एक दोन दिवसांच्या सवडीने पुण्यात येणं, त्यांना त्यावेळी माझी नेमकी आठवण होणं, त्यांनी मला आवर्जून फोन करणं, त्यांच्या लेक, जावयाच्या घरी आमची भेट होणं, त्या दोघांनी नेमकी अलिकडेच त्यांची नवीन प्रकाशन संस्था सुरु केलेली असणं, सरांचा माझ्यावर अतिशय लोभ असल्यामुळे त्यांना माझा नवीन कथासंग्रह या त्यांच्या घरच्याच प्रकाशन संस्थेतर्फे प्रकाशित व्हावा असं वाटणं, यासारख्या फार फार तर महिन्याभरातच घडून गेलेल्या अचंबित करणाऱ्या घटनांच्या रूपातल्या ‘त्या’च्या कृपालोभाच्या असंख्य धाग्यादोऱ्यांनी घातली गेलेली घट्ट वीण अखेर माझ्या उर्वरित आयुष्याला एक अनोखी कलाटणी देऊन जाणार आहे हे मात्र माझ्या गावीही नव्हतं! …)

पण त्याची प्रचिती देणाऱ्या अशा कांही घटना नंतर घडत गेल्या कीं मनात हे सगळं खरंच सत्य कीं स्वप्न असा संभ्रम निर्माण व्हावा!

माझ्या बँकेचे रोजचे रुटीन आणि न संपणाऱ्या कामांच्या व्यापात एक प्रूफ रिडिंग (तेही मी माझ्या समाधानासाठीच केलेले..) वगळता माझा कथासंग्रह आकाराला येण्याच्या प्रोसेसमधे मी इच्छा असूनही माझा प्रत्यक्ष सहभाग फारसा देऊच शकलो नव्हतो. मुखपृष्ठ, चांगल्या मुद्रकाचा शोध, मुद्रितांच्या कॉपीज् काळजीपूर्वक तपासणे, प्रकाशन समारंभाचे नियोजन, त्यासाठी आमंत्रितांच्या येण्या-जाण्याच्या सोयीचा विचार करून पुण्यात मध्यवर्ती भागातला हॉल शोधणे, प्रमुख पाहुण्यांची निवड, त्यांच्याशी चर्चा, त्यांना आमंत्रण, त्यांच्या वयाचा विचार करून त्यांच्या प्रवासाची, वास्तव्याची, स्वास्थ्याची विशेष काळजी घेणे, या सगळ्याबरोबरच कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिका छपाईच्या व्यवस्थेपर्यंतच्या सगळ्याच आघाड्या वेळोवेळी अतिशय व्यवस्थित सांभाळत होते ते स्वतः राजू आणि नितीन हेच दोघे!

मी पुण्यात फॅमिली शिफ्ट केलेली नसली तरी टिळक रोडवरील ‘अपूर्वा अपार्टमेंट’ मधे वन रूम किचनचा एक फ्लॅट भाड्याने घेतलेला होता. स्वैपाक न् भांड्याला बाई यायच्या. त्यामुळे शाळा/काॅलेजना सुट्ट्या असतील तेव्हा आरती/सलिल येऊ शकतील आणि बदल म्हणून आईही इथे येऊन सलग कांही दिवस राहू शकेल हा त्यामागे उद्देश होता. या कथासंग्रहाचं नियोजन सुरू झालं त्याच दरम्यान योगायोगाने आई इथे आलेलीच होती. प्रकाशन समारंभाचं नियोजन सुरू झालं त्याच दरम्यान माझ्या सासूसासऱ्यांचंही पुण्यात येणं होणार होतं. माझी मोठी बहिण-मेव्हणेही आवर्जून येणार होते. मोठा भाऊ तर पुण्यातच होता. या खेरीज अगदी जवळचे असे इतर बरेच नातेवाईकही पुण्यातच होते. ते सर्वजणही येणार होते. एरवी आवर्जून ठरवायचं म्हटलं तरी सर्वांना एकत्रित आणणारा अशा कौटुंबिक सोहळ्याचा योग सहजासहजी येणं शक्यच नव्हतं. आणि हे सगळं आता शक्य होणार होतं ते असं अगदी अचानक ठरलेलं असूनही अल्पकाळातच आकाराला येऊ लागलेल्या माझ्या ‘स्पर्श प्रकाशाचा’ या कथासंग्रहाच्या प्रकाशनाचा योग आला होता म्हणूनच!

या सगळ्या घटनांना निमित्त झाल्या त्या नाईकसरांच्या मनातल्या माझ्याबद्दलच्या सद्भावना आणि त्यामुळेच त्यांचा मला आलेला त्या दिवशीचा ‘तो’ अनपेक्षित फोन!

खरंतर आत्तापर्यंतच्या योगायोगानेच घडाव्यात तशा घडत गेलेल्या या घटनाही त्यामधे लपलेल्या ‘त्या’च्या कृपालोभाची जाणीव करून द्यायला पुरेशा होत्या माझ्यासाठी. पण याही पेक्षा आश्चर्यकारक आणि तितक्याच सुखद योगायोगाचे धागेदोरेही याच सगळ्या घडामोडींशी घट्ट जुळणार होते ज्यामुळे माझ्या उर्वरित आयुष्याला तोवर मी कधी कल्पनाही केली नव्हती असं अनोखं वळणही मिळणार होतं!!

ते सगळं आज आठवतानाही स्वप्नवतच वाटत रहातं!

याच संदर्भात त्या कार्यक्रमाची रूपरेषा ठरवण्यासाठी आम्ही बसलो होतो तेव्हा नितीन म्हणाला,

” ‘स्पर्श प्रकाशाचा’ शं. ना. नवरे यांच्या हस्ते प्रकाशित व्हावं असं मला वाटतं. “

शं. ना. नवरे माझेही आवडते लेखक होतेच. पण तरीही या छोट्याशा कामासाठी ते डोंबिवलीहून पुण्यापर्यंत यायला तयार होतील का? हा प्रश्न होताच. पण नितीनने त्यांना फोन केल्यावर प्रकाशन समारंभ कधी आहे हे विचारून घेऊन, ते कसलेही आढेवेढे न घेता ‘हो’ म्हणाले, हा एक शुभशकूनच आहे असंच मला वाटलं. राजू, नितीन आणि मी तिघेही कार्यक्रम व्यवस्था, निमंत्रितांचं स्वागत, या सगळ्या देखभालीत व्यस्त असताना शं. नां. ची लोकप्रियता आणि त्यांचं वय लक्षात घेता त्यांना पुणे स्टेशनवर रिसीव्ह करण्यापासून परतीच्या प्रवासात निरोप देईपर्यंत त्यांच्या सोबत राहू शकणारी दुसरी एखादी जबाबदार व्यक्ती आवश्यक होती. पण सहज उपलब्ध होणारं त्यावेळी कुणीच नजरेसमोर येईना. अखेर नितीननेच शन्नांना कार्यक्रमाच्या दिवशी रविवारी सकाळी पुणे स्टेशनवर रिसिव्ह करण्यापासूनची सगळी जबाबदारी स्वत:कडे घेतली आणि प्रकाशक म्हणून राजू आणि लेखक म्हणून मी अशा आम्हा दोघांना त्याने प्रकाशन समारंभाच्या हॉलवरची सर्व व्यवस्था पहाण्यासाठी पूर्ण वेळ उपलब्ध करून दिला.

प्रकाशन समारंभ टिळक रोडवरच्या ‘टिळक स्मारक मंदिर’ मधील हाॅलमधे करायचं ठरलं तो रविवार होता.

अर्थात त्या आधीचे शुक्रवार आणि शनिवार अशा दोन दिवसांच्या रजेचं नियोजनही मी आधीपासूनच करून ठेवलं होतं. पण… ऐनवेळी अचानक अशी विचित्र परिस्थिती उद्भवली कीं त्या दोन्ही दिवसांची रजा रद्द करून मला पूर्णवेळ आॅफिस अॅटेंड करणं अपरिहार्यच होऊन बसलं!

याला निमित्त झालं ते सेंट्रल आॅफिसमधून अचानक आलेला एक महत्वाचा फॅक्स आणि पाठोपाठ आलेल्या त्याला पुष्टी देणाऱ्या फोनचं! आमच्या जी. एम्. मॅडम नेमक्या शुक्रवारीच झोनल आॅफिस व्हिजीटसाठी येणार होत्या. आणि शनिवारी इथल्या लोकल ब्रॅंचेसपैकी दोन ब्रॅंचेस् ना भेट देऊन त्या पुढे कोल्हापूर रिजनल आॅफिसला मिटिंगसाठी जाणार होत्या! त्यामुळे आमच्या आॅफिसमधे महत्वाच्या बाबींबद्दल धोरणात्मक चर्चा, दुपारी उशीरपर्यंत सुरू राहू शकणारी लंच मिटींग आणि शनिवारच्या लोकल ब्रॅंच व्हिजीटची व्यवस्था यासाठी आम्हा सर्वांची उपस्थिती आणि सहभाग अपरिहार्यच होता हे ओघानं आलंच!

या सर्व अनिश्चिततेला सामोरं जाताना मी खूप अस्वस्थ होतो. हातातोंडाशी आलेलं खूप कांही हातून निसटून जात असल्याच्या भावनेने ती अस्वस्थता अधिकच वाढत गेली. हाकेच्या अंतरावर आलेल्या प्रकाशन समारंभाचा आनंद हिरावून घेणारी, फार मोठा अडसर होऊन बसलेली परिस्थिती निर्माण करणारी आमच्या जी. एम्. मॅडमची ही व्हिजीट मला त्या अस्वस्थतेत एखाद्या भयंकर संकटासारखीच वाटत राहिली! .. पण प्रत्यक्षात मात्र ती माझ्यासाठी ‘त्या’नेच घडवून आणलेली इष्टापत्तीच ठरणार होती हे मला कुठं माहित होतं?

इष्टापत्तीच नाही तर काय? कारण ठरल्याप्रमाणे शुक्रवारी मॅडम आल्या आणि अचानक घटनाच अशा घडत गेल्या कीं मनातली अस्वस्थता क्षणार्धात विरूनच गेली..!

फार मोठ्ठं संकट भासणारी ही जी. एम्. मॅडमची व्हिजीट संकट नव्हे तर माझ्या पुरता तरी एक शुभशकूनच ठरला होता!!

क्रमश:…  (प्रत्येक गुरूवारी)

©️ अरविंद लिमये

सांगली (९८२३७३८२८८)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ युगप्रवर्तक स्वामी विवेकानंद… ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

? विविधा ?

☆ युगप्रवर्तक स्वामी विवेकानंद ☆ प्रस्तुती : श्री सुहास रघुनाथ पंडित 

* ‘राष्ट्रीय युवा दिन‘ – – *स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिन १२ जानेवारी हा भारतात राष्ट्रीय युवा दिनम्हणून संपन्न होतो. या प्रेरणादायी दिनाच्या शुभेच्छा !!*

*”उठा, जागे व्हा, आणि ध्येय साध्य होईपर्यंत थांबू नका. धैर्य हेच जीवन आहे आणि भ्याडपणा हे मृत्यूचं लक्षण आहे. प्रेम म्हणजे जीवन तर द्वेष म्हणजे मृत्यू. मी हे करू शकत नाही असं कधीही म्हणू नका, कारण तुमच्या अंर्तमनात प्रचंड शक्ति आहे. या शक्तिच्या मदतीनं तुम्ही अशक्य वाटणारं कामही शक्य करून दाखवू शकता. तुम्ही जसा विचार कराल तसे व्हाल. दुर्बल समजलात तर दुर्बल व्हाल. तेव्हा, उठा जागृत व्हा. तुम्ही जसा विचार करता तसे बनता. स्वतःला घडविण्यात एवढे व्यस्त रहा की इतरांचे दोष काढण्यासाठी वेळच मिळणार नाही.”*

*इति.. स्वामी विवेकानंद*

*भारतररत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात.. अलीकडच्या शतकात भारताने निर्माण केलेला सर्वात मोठा माणूस म्हणजे विवेकानंद. तर सुभाषचंद्र बोस म्हणतात.. आम्ही विवेकानंदांना आधुनिक राष्ट्रीय चळवळीचे ‘आध्यात्मिक पिता’ म्हणतो.*

*सन १८९३.. शिकागोतील जागतिक सर्वधर्म परिषदेतील पहिल्याच वाक्याला सतत दोन मिनिटं टाळ्या वाजत होत्या. प्रथमच समस्त जगाला एकसूत्रात जोडले गेले. “अमेरिकेतील माझ्या बंधू आणि भगिनींनो”.. या भगवाधारीने पहिल्याच वाक्याने जग जिकंले. या वाक्यातील हिंदू संस्कृतीचा उदात्त भाव जगाला लक्षात आला. जगात प्रथमच कुणीतरी जगाशी भावाबहिणीचे पवित्र नाते जोडले होते.*

*आज १२ जानेवारी. याच दिवशी जगाला प्रत्येक ‘जीव हा शिव आहे’ हे हिंदू धर्म सहिष्णूतेचे अव्दैत वैदिक तत्त्वज्ञान.. भारतीय योगदर्शन जगाला सांगणाऱ्या या एका तेजस्वी संन्यासाचा जन्म झाला.. नरेंद्रनाथ दत्त. १८६३ साली जन्म कलकत्ता. वडील तत्कालीन वकील. आई भुवनेश्वरी धार्मिक प्रवृतीची. जगात ओळख निर्माण झाली स्वामी विवेकानंद.*

*जनतेच्या उद्धारासाठी त्यांना गुरुमंत्र देणारे दैवी पुरुष जगविख्यात गुरू लाभले रामकृष्ण परमहंस. त्यांचे कार्य पूढे नेण्यासाठी विवेकानंदांनी रामकृष्ण मठाची स्थापना केली. सर्वप्रथम भारत भ्रमण करुन जनतेची दुःख बघितली. माणसातील सुप्त मनुष्यत्व जागविण्यासाठी.. वेदान्त विचार जगाला पटविण्यासाठी सर्वधर्म परिषदेत मातृभूमीचा सेवक म्हणून भाग घेतला.*

*अमेरिका.. इंग्लंड.. युरोप दौऱ्यात त्यांच्या मानवतावादी तेजस्वी व्यक्तीमत्वाचा.. वाणीचा.. मानवतावादी विचारांचा एवढा प्रभाव पडला की जगाला उर्जा देणारे युगपुरुष ख्याती झाली. स्वामी विवेकानंदामुळे जगाची भारताकडे बघण्याची दृष्टीच बदलली. जगात भारतीय तत्त्वज्ञानाचे महत्त्व पटले. स्वामी विवेकानंद म्हणजे जीवनात उर्जा देणारे.. गीता सांगणारे आधुनिक श्रीकृष्णच.*

*विवेकानंदांची अचाट बुद्धिमत्ता.. स्मरणशक्ती.. ज्ञानार्जनाची क्षमता सारेच विस्मयकारी.. अविश्वसनीय पण सत्य आहे. प्रत्येक विचार जीवनात प्रेरणादायी आहेत. यामुळेच आज बेलूरचा मठ असो वा कन्याकुमारीचे स्वामी विवेकानंद स्मारक ही आमच्या साठी ऊर्जा स्थाने आहेत.*

*स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिन १२ जानेवारी हा भारतात ‘राष्ट्रीय युवा दिन’ म्हणून संपन्न होतो. या प्रेरणादायी दिनाच्या शुभेच्छा !!*

*स्वामी विवेकानंदांनी आम्हाला धीरता.. शूरता.. वीरता आणि विद्येसह नम्रता.. सज्जनांचे रक्षण आणि दुर्जनांना शासन हा गुरु मंत्र दिलाय. हा गुरुंचा वारसा आपण चालवू या. अशा या युगपुरुषाला जन्मदिनी विनम्र अभिवादन.*

*एक सुराने गाऊ आम्ही*

*स्वामीजींची गाथा*

*स्वामीजींच्या पदरेणूने*

*पावन भारतमाता*

*भारतभूचे दैन्य बघोनी*

*अवतरले जगतात*

*दया, क्षमा, करुणा अन साहस*

*वसे सदा हृदयात*

 *

*निर्भयता, सामर्थ्याचा संदेश*

*दिला जगतास*

*ज्ञानरवीचा उदय जाहला*

*तम गेला अस्तास*

 *

*देश-विदेशी गमन करोनी*

*सांगितला वेदांत*

*सर्व जगाला मंत्र दिला हो,*

*उत्तिष्ठत जाग्रत*

 *

*त्याग, विवेक नी वैराग्याला*

*बाणविले अंगात*

*अवघे जीवन अर्पित केले*

*देशाच्या सेवेत*

 *

*ध्यानधारणा आणि तपस्या*

*असा घेतला ध्यास*

*रामकृष्ण गुरु आशिष देती*

*अपुल्या प्रिय शिष्यास*

 *

*सार्थक केले दीक्षा घेऊन*

*नाम विवेकानंद*

*ब्रह्मपरायण नरनारायण*

*अनुभवती स्वानंद*

 *

*वंदन करितो तुमच्या चरणी*

*आम्ही स्वामीराया*

*नरनारायण सेवेसाठी*

*झिजो आमुची काया*

 *

*गीत : स्वामी श्रीकांतानंद* 

 

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती : श्री सुहास रघुनाथ पंडित 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ परिमळु… ☆ सौ शालिनी जोशी ☆

सौ शालिनी जोशी

🔅 विविधा 🔅

☆ परिमळु… ☆ सौ शालिनी जोशी

अवचिता परिमळु झुळकला अळुमाळु

तो मी म्हणे गोपाळु आला गे माये

माऊलींचा हा अभंग वाचला आणि परिमळु या ठिकाणी मन घुटमळले. परिमाळु किती सुंदर शब्द! त्यात गोडवा आहे. तरलता आहे. प्रेम आहे. परिमाळु म्हणजे आपण नेहमी म्हणतो तो सुगंधच. पण माऊलींचा तो अवचिता, झुळकला आणि अळुमाळु आहे. तीनही विशेषणे वैशिष्ट्यपूर्ण आहेत. तो अचानक येणारा, वाऱ्याच्या झुळके सारखा, थोडा थोडा आहे. कारण तो गोपाळाच्या (आत्मारामच्या) आगमनाची सूचना देणारा आहे. ज्ञानेश्वरांच्या विरही मनाला जाणवलेला आहे. त्यांच्यातल्या विरहिणीने केलेले हे वर्णन. ही भाषा माऊलीनाच शोभते.

परिमळु म्हणजे परिमल, सुगंध, गंध, सौरभ, दरवळ, सुवास असे बरेच शब्द असले तरी आपल्याला वास येतात ते फळांचे, फुलांचे. खरंतर वासाचा उगम पृथ्वीतत्वात आहे. गंध हा पृथ्वी तत्वाचा गुण. पहिला पाऊस पडल्यावर जो मृद्गंध परिसर सुगंधित करतो, सर्वांना हवाहवासा वाटतो, तो हाच. तो शुद्ध व पवित्र, ज्याला भगवंत आपली विभूती मानतात. ’ पुण्यो गंध: पृथिव्याम्’ (गी. ७/९) तो हाच. कारण पृथ्वी हे सगळ्या गंधांचे मूळ आहे. जे जे पृथ्वी तत्वातून निर्माण झाले, त्यात गंध हा गुण आला. पण प्रत्येकाचा गंध वेगळा. कसा ते शब्दाने सांगता येत नाही. तो अनुभवावाच लागतो.

हजारो प्रकारची फुले आहेत. पण गुलाबाचा गंध राजेशाही, मोगऱ्याचा गोडसर, सोनचाफ्याचा लपून न राहणारा. म्हणून गदिमा म्हणतात, ’ लपविलास तू हिरवा चाफा, सुगंध त्याचा लपेल का? ’ सुगंध हा काव्य विषय झाला. तो कुपित भरून ठेवता येत नाही. मनाच्या कुपीतच त्याला स्थान. पण एक फुल हातात घेतलं की, ओंजळ मात्र सुवासाने भरून जाते.

केवडा, रात्रराणी, निशिगंध, शेवंती इत्यादी फुलांबरोबर फळांचे, पानांचे व मुळांचे वेगवेगळे गंध असतात. आंबा, फणस, पेरूचे वास घर भरून टाकतात. कढीलिंब, कोथिंबीर पानं खाद्य पदार्थाची चव वाढवतात. आलं, बासमती तांदूळ, केशर, कापूर, चंदन, मसाल्याचे पदार्थ किती म्हणून सुगंध सांगावे? त्याला सीमाच नाही. वासाचा मनाबरोबर शरीरावरही परिणाम होतो. म्हणून ‘आरोमा थेरपी’ नावाची वैद्यकशास्त्राची शाखा निघाली. त्याचा उपयोग मन शांत करण्यासाठी, ताण व अस्वस्थता कमी करण्यासाठी होतो. असा सुगंध जादूगार आहे. म्हणून दिवाळीत चंदनाचा साबण, मोगऱ्याचे तेल वापरतो. आयुर्वेदातही ज्येष्ठमध जटामांसी अशा सुगंधी वनस्पतींचा वापर केला जातो.

 या सुगंधापासून परफ्युम, उद्बत्त्या, सुगंधी मेणबत्त्या, अत्तरे, साबण, शाम्पू, सौंदर्यप्रसाधने, फर्शी पुसायचे द्रव्ये, कुंकू, अष्टगंध इत्यादी कितीतरी वस्तू तयार केल्या जातात. त्यामुळे उद्योगधंदे वाढले. असे आपले जीवन गंधमय आहे. सकाळी उठल्यावर वापरायची पेस्ट किंवा दंतमंजन शब्द तयार झाले. गंध, सुगंध, दरवळ, दर्प, वास, दुर्गंध सगळे वासाशी संबंधित पण वापरताना वेगवेगळ्या परिस्थितीत वेगवेगळा शब्द. मंदिरातील धुपाचा मंद दरवळ, सुगंध म्हंटल की अत्तराची कुपी, दुर्गंध म्हटलं की गटार, सुवास नाकाला हवाहवासा वाटणारा, उग्र दर्प काहीसा नकोसा, दुर्गंध म्हटलं की गटार नकोसा. वास सरसकट वापरला जाणारा, फुलवाल्याकडे संमिश्र दरवळ, भाजीवाल्याकडे कांदा, लसूण, कोबी, मुळे असे उग्र वास. कोऱ्या कपड्यांचा आणि कोऱ्या पुस्तकांचाही वेगळाच, घामाचा कुबट वास, तंबाखू तपकिरीलाही आणखी वेगळा वास. अशी ही गंध कहाणी वाढवावी तेवढी वाढवारी. पण एवढे मात्र खरे,

सुगंध हे निसर्गाचे देणे

नसे भाषा आकार रूप लेणे

तरीही हवाहवासा वाटतो

प्रपंच परमार्थात साथीदार तो

 

©  सौ. शालिनी जोशी

संपर्क – फ्लेट न .3 .राधाप्रिया  टेरेसेस, समर्थपथ, प्रतिज्ञा मंगल कार्यालयाजवळ, कर्वेनगर, पुणे, 411052.

मोबाईल नं.—9850909383

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ ‘सिद्धिविनायकाचे विलोभनीय दर्शन’ ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्री विश्वास देशपांडे

? विविधा ?

☆ सिद्धिविनायकाचे विलोभनीय दर्शन ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

तेरा आणि चौदा ऑगस्ट हे (२०२४) दोन दिवस अत्यंत संस्मरणीय असे ठरले. सांगलीला काही कौटुंबिक कार्यक्रमानिमित्त जाणे झाले. या दोन दिवसात सहकुटुंब देवदर्शनाचा लाभ घेता आला आणि खरोखरोच खूप प्रसन्न वाटले. या दोन दिवसात सांगलीतील प्रसिद्ध गणपती मंदिर, नरसोबा वाडी, जयसिंगपूर येथील सिद्धिविनायकाचे मंदिर आणि चाफळ येथील श्री राम मंदिर यांचं दर्शन घेण्याचं भाग्य लाभलं. पण आज मी प्रामुख्याने बोलणार आहे ते जयसिंगपूर येथील सिद्धिविनायक मंदिराबद्दल.

जयसिंगपूर येथील माझे मित्र श्री मदन बुरांडे मला अनेक दिवसांपासून घरी या म्हणून बोलावत होते. १४ ऑगस्टला तो योग अचानक आला. सांगलीपासून अवघ्या ११ किमी वर जयसिंगपूर आहे. छत्रपती शाहू महाराजांचे वडील राजे जयसिंग यांचे नाव या गावाला देण्यात आले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यात हे गाव आहे. कोल्हापूरपासून जयसिंगपूर अवघ्या ३८ किमी अंतरावर आहे. शहराच्या पूर्वेला कृष्णा नदी वाहते. हे शहर तंबाखू, गूळ, मिरची आदींच्या व्यापारासाठी प्रसिद्ध आहे. दूध, दुधाचे पदार्थ या ठिकाणी उत्तम मिळतात. फळे, भाजीपाला यांचीही चांगली आवक आहे. दळणवळणाच्या दृष्टीने हे शहर राज्याशी आणि देशाशी एस टी आणि रेल्वे सेवेने जोडले गेले आहे. विविध प्रकारचे शालेय, महाविद्यालयीन आणि व्यावसायिक शिक्षण देणाऱ्या अनेक उत्तम शैक्षणिक संस्था या शहरात आहेत.

मदनजी यांच्याकडे जाण्यापूर्वी त्यांना फोन केला होता. मी, सौ. श्रद्धा आणि माझी कन्या चि. सौ सारिका असे आम्ही तिघेजण सकाळी लवकरच जयसिंगपूरला पोहोचलो. श्री मदनजी आणि सौ वहिनी आमची वाटच पाहत होते. पहिल्यांदाच त्यांच्या घरी गेल्यामुळे त्यांना खूप आनंद झाला. त्या दोघांनी आमचे मनापासून स्वागत आणि उत्तम असे आदरातिथ्य केले. नंतर श्री मदनजी म्हणाले ‘ इथून जवळच सिद्धिविनायकाचे अतिशय सुंदर मंदिर आहे. तुम्ही ते पाहिल्याशिवाय जाऊ नका. ‘ त्यांच्या प्रेमळ सूचनेनुसार आम्ही सिद्धिविनायकाचे दर्शन घ्यायचे ठरवले. आमच्यासोबत ते स्वतः मंदिर दाखवण्यासाठी आले. त्यांच्या घरापासून साधारण एक दीड किमी अंतरावर मौजे आगर, जयसिंगपूर येथे हे मंदिर आहे.

दुरूनच हे मंदिर आपले लक्ष वेधून घेते. सिद्धिविनायक ट्रस्टने या मंदिराची निर्मिती केली आहे. दुरून ऑक्टोपसच्या आकाराचे दिसणारे पण कमळाच्या पाकळ्यांचा आकार असलेलं हे मंदिर खरोखरच आगळंवेगळं आहे. अशा प्रकारचं मंदिर महाराष्ट्रात तरी माझ्या पाहण्यात नाही. या मंदिराच्या बांधणीतील कल्पकता आणि बांधकामातील कौशल्य अप्रतिम आहे. आज कोणतीही वास्तू बांधताना साधारणपणे लोखंड आणि सिमेंट यांचा वापर केलेला आपल्याला आढळतो. त्याशिवाय कोणतेही बांधकाम पूर्ण होत नाही. पण हे मंदिर मात्र सिमेंट आणि स्टील यांच्या वापरापासून मुक्त आहे. दगड, विटा आणि चुना या नैसर्गिक गोष्टींचा वापर करून हे मंदिर बांधण्यात आहे. पण हे मंदिर एवढे सुंदर, कलात्मक आणि भक्कम आहे की त्याच्या बांधकामात सिमेंट आणि स्टीलचा वापर केलेला नाही यावर विश्वास ठेवणे कठीण जाते. या मंदिराच्या निर्मितीत वापरली गेलेली वीट आपण वापरतो तशा सर्वसाधारण प्रकारची नाही. बेळगाव जिल्ह्यातील खानापूर येथून ही मशीन कट वीट खास बनवून घेण्यात आली आहे. या विटेच्या वापरामुळे तसेच विशिष्ट प्रकारचा चुना आणि दगड यांचा वापर केलेला असल्याने हे मंदिर किमान पाचशे वर्षे टिकेल असा जाणकारांचा अंदाज आहे.

मंदिराच्या भोवताली रमणीय बाग आणि लॉन आहे. भाविकांना बसण्यासाठी बाकांची व्यवस्था आहे. विशेष प्रसंगी रात्रीच्या वेळी मंदिरावर रोषणाई केली जाते, त्यावेळी तर मंदिर फारच नयनरम्य दिसते. मंदिराच्या बाहेरच्या बाजूला सजवलेल्या एका भव्य अशा गजराजाची मूर्ती आहे. त्याच्याच बाजूला श्री सिद्धिविनायकाचे वाहन असलेल्या मूषकाची मोठी प्रतिमा आहे. त्याच्या हातात मोदक आहे. आपल्या मनातील इच्छा या मूषकाच्या उजव्या कानात सांगायची. ती इच्छा पूर्ण होतेच अशी भाविकांची श्रद्धा आहे.

श्री गणेशाला अग्रपूजेचा मान आहे. कोणत्याही पूजाविधीची सुरुवात श्री गणेशाच्या आराधनेशिवाय होत नाही. श्री गणेश हा अष्टदिशांचा स्वामी असून विघ्नहर्ता आहे. त्यामुळे सर्व दिशा मोकळ्या होतात. सर्व विघ्नांचा नाश होतो असे आपण मानतो. या आपल्या श्रद्धेला अनुसरूनच या मंदिराच्या प्रदक्षिणा मार्गात अष्ट दिशांना प्रत्येकी एक अशा अष्टविनायकांच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली आहे. मंदिराच्या बाहेरच्या बाजूला सुंदर कमानी आहेत. त्या कमानींमध्ये असलेल्या आठ स्तंभांवर अष्टविनायक विराजमान झाले आहेत. या कमानी अत्यंत देखण्या आहेत. बाहेरच्या बाजूने लांबून या कमानींकडे पाहिले तर हत्तीच्या सोंडेचा भास होतो. मंदिराला प्रदक्षिणा करताना अनायासेच आपलं अष्टविनायकांचंही दर्शन पूर्ण होतं.

आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक अष्टविनायकाच्या मूर्तीपुढे बाहेरच्या बाजूस हातात मोदक घेतलेला मूषक आहेच.

जेवढे मंदिराचे बाह्य स्वरूप देखणे आहे, तेवढेच अंतरंग देखील! मंदिराच्या २१ पायऱ्या चढून आपण आत गेलो की दृष्टीस पडते ती श्रींची एक अतिशय सुंदर पांढऱ्या शुभ्र संगमरवरात घडवलेली मूर्ती. ही मूर्ती पाहताच शांत, प्रसन्न वाटते. कमलदलात स्थानापन्न झालेली सुमारे ३० इंच उंचीची ही मूर्ती उजव्या सोंडेची आहे. ही मूर्ती पाहताच आपण नतमस्तक होतो आणि हात आपोआप जोडले जातात. ही श्रींची मूर्ती पृथ्वीवर स्थानापन्न असून वरच्या बाजूला आकाशाचे प्रतीक म्हणून निळा रंग देण्यात आला आहे. केवळ पृथ्वीवरच नव्हे तर अवघ्या विश्वात ईश्वर व्याप्त आहे हेच जणू ही रचना आणि रंगसंगती सूचित करते. त्याचप्रमाणे पृथ्वी, आकाश आणि मोक्ष या संकल्पना देखील त्यातून सूचित होतात. मूर्तीच्या पाठीमागे १०८ टोकांची प्रभावळ सोनेरी रंगात असून त्यातील मधल्या बाजूस श्रीगणेशाचा आवडता लाल रंग देण्यात आला आहे. २८ डिसेंबर २०१२ या दिवसाच्या शुभमुहूर्तावर संत प. पु. गोविंददेव गिरीजी महाराज (आचार्य श्री किशोरजी व्यास) यांच्या शुभहस्ते श्रींचा प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडला.

या मंदिराचे वैशिष्ट्य असे की चैत्र शुद्ध प्रतिपदेला म्हणजेच गुढीपाडव्याच्या दिवशी सूर्याची किरणे प्रवेशद्वारातून आत येऊन थेट मूर्तीवर अभिषेक करतात. प्रवेशद्वारावर असलेली भव्य दगडी कमान जणू त्या सूर्यकिरणांचे स्वागत करण्यासाठीच उभी आहे असे वाटते. मंदिराच्या गाभाऱ्यात श्री गणेश पुराणातील आणि श्री गणेशाच्या जीवनातील महत्वाचे प्रसंग शिल्पांकित केलेले आहेत.

या मंदिराचा आणखी एक विशेष असा आहे की नऊ या अंकाशी या मंदिराचे विलक्षण साधर्म्य आहे. हे मंदिर पूर्ण होण्यासाठी नऊ वर्षे लागली. ज्या दिवशी हे काम पूर्ण होऊन प्राणप्रतिष्ठा झाली, तो दिवस होता २८/१२/२०१२. या तारखेतील सर्व अंकांची बेरीज केली असता ती सुद्धा नऊ येते हा विलक्षण योगायोग आहे. मंदिरातील मूर्तीचे वजन १०८ किलो आहे. मूर्तीभोवती १०८ टोकांची प्रभावळ आहे. मंदिरातील घंटेचे वजन १०८ किलो आहे. १०८ या संख्येतील अंकांची बेरीज ९ येते. श्रींची मुख्य मूर्ती आणि बाहेरील अष्टविनायक असे मिळून नऊ श्रींच्या मूर्तींचे दर्शन होते. त्याचप्रमाणे मूषकही नऊच आहेत.

नऊ या अंकाचं एवढं विलक्षण महत्व काय असावं असं वाटून मी त्यासंबंधीची माहिती घ्यायला सुरुवात केली आणि मोठी मनोरंजक माहिती हाती आली. जशी रेडिओ लहरींची (तरंगांची) फ्रिक्वेन्सी असते, जिला आपण ‘ हर्ट्झ ‘ या एककात मोजतो, तशीच प्रत्येक व्यक्तीची आणि प्रत्येक वस्तूची फ्रिक्वेन्सी असते असे मानले जाते. प्रत्येक व्यक्तीचे त्याच्या जन्मतारखेनुसार चार उच्च कंपन तरंग आणि चार निम्न कंपन तरंग असतात. अगदी त्याचप्रमाणे विश्वशक्तीचेही स्वतःचे विशिष्ट कंपन तरंग असतात आणि नऊ हा अंक विश्वशक्तीचा विशिष्ट कंपन तरंग अंक आहे असे मानले जाते. असे म्हणतात की प्रत्येक व्यक्तीला त्याच्या उच्च कंपन तरंगांसह विश्वशक्तीच्या संपर्कात येणे आवश्यक असते. हे जेव्हा घडते, तेव्हा विश्वशक्ती त्याच्या जीवनात यायला सुरुवात होते. अशा व्यक्तीच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडायला लागतात.

विश्वातील प्रत्येक आकार नऊने बनलेला आहे. चक्र किंवा वर्तुळ ३६० अंशांचे असते. यातील अंकांची बेरीज ९ येते. तसेच एक तास म्हणजे ३६०० सेकंद. चौरस किंवा आयताकृतीतील कोनांची बेरीज ३६० येते. त्रिकोणाच्या तीन कोनांची बेरीज १८० असते. पंचकोनातील एकूण कोनांची बेरीज ५४० येते. षटकोनांच्या कोनांची बेरीज ७२० येते. यातील कोणत्याही संख्येच्या अंकांची बेरीज केली असता ती नऊ येते. आईच्या पोटात नऊ महिने राहिल्यानंतर मनुष्याचा जन्म होतो. त्याचप्रमाणे नवग्रह, नवरत्ने, नवरात्री या सगळ्या गोष्टीत नऊचे महत्व आहे. यावरून हा निष्कर्ष काढता येतो की हे मंदिर नऊ या अंकाने वेगवेगळ्या प्रकारे विश्वशक्तीशी जोडले गेले आहे. आपणही या मंदिरात या विश्वशक्तीशी जोडले जातो. श्री गणेश ही बुद्धीची, विद्येची देवता आहेच. तो विघ्नहर्ताही आहे. अशा या सिद्धिविनायकाचे विलोभनीय दर्शन आम्हाला घेता आले याचा आनंद झाला. नरसोबा वाडी किंवा कोल्हापूरपासून हे ठिकाण जवळ असल्याने भाविकांनी एकदा तरी या मंदिराला जरूर भेट द्यावी.

© श्री विश्वास देशपांडे

चाळीसगाव

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “लग्न आहे सहजीवन…” – भाग २ ☆ श्री जगदीश काबरे ☆

श्री जगदीश काबरे

☆ “लग्न आहे सहजीवन…” – भाग २ ☆ श्री जगदीश काबरे ☆

 (अशी पतिव्रतेची कर्तव्ये सांगून तिच्यावर पुरुषाच्या बंधनात राहण्यासाठी दिलेली वचने याचे गारुड आहे.)

हे बदलायचे असेल तर, स्त्रियांनी आई झाल्यावर अगदी लहानपणापासूनच आपल्या मुलांना वाढवतांना मुलगा/मुलगी असा भेद खेळणी देतांना वा घरातील कामे सांगण्यात करू नये. मुलांवर स्त्री ही एक व्यक्ती आहे, असे बिंबवून तिचा आदर करण्याचे संस्कार करायला हवेत. मुलींना मुलांसारखेच स्वसंरक्षणाचे बाळकडू पाजायला हवे. मुलांना ‘तू बायल्या सारखा का वागतो? हातात बांगड्या भरल्या आहेस का? मुलीसारखा मळूमुळू काय रडतोस? ‘ अशाप्रकारचे स्त्रीला कमी लेखणारे, दुय्यम समजणारे आणि भेदभाव कारणारे संस्कार करू नयेत. वयात येणाऱ्या मुलामुलींना योग्य शब्दात शास्त्रीय माहिती दिली तर मुले, मुलींकडे फक्त शारीरिक दृष्टीने बघणार नाहीत. शारीरिक बदल ही एक नैसर्गिक घटना आहे आहे असे समजुन एकमेकांकडे निकोप दृष्टीने पाहायला शिकतील. घरातील मुलींना त्यांच्या आवडीचे शिक्षण दिले पाहिजे. शिवाय त्यांना शारीरिक सामर्थ्य कमावण्यासाठी, स्वत:चे संरक्षण स्वत:ला करता यावे यासाठी प्रशिक्षण दिले पाहिजे. शाळेमध्ये आठवडय़ातील काही तास मुलामुलींसाठी पाककलेचे दिले पाहिजेत. रोजच्या आहारातील खाद्यपदार्थ सर्व विद्यार्थ्यांना करता आलेच पाहिजेत. हा विषय सक्तीचा असावा. सायकल किंवा स्कूटर चालवणे, पोहणे ही कौशल्ये शाळेतच विकसित व्हावीत. त्यात मुलगा-मुलगी असा फरक केला जाऊ नये. मुलीचा व्यक्तिमत्त्व विकास झाला की तिला आपोआप समाज आदराने वागवेल. मुलाला लहानपणीच जर घरातील कामे करण्याची सवय लावली तर त्याची पुरुषी वर्चस्वाची मानसिकता आपोआप कमी होईल. अशाप्रकारे जर घरातच मुलामुलींना समान वागणूक देऊन वाढवले तर पुढच्या पिढीत बलात्काराचे प्रमाण नक्की कमी होईल.

पण स्त्रीला उडण्यासाठी आकाश उपलब्ध करून दिलं गेलं तरी पक्षी म्हणून भरारी मारू देण्यापेक्षा पतंग बनवून त्याच्या दोऱ्या स्वत:च्या हातात ठेवण्याचा दुटप्पीपणा हे या पुरुषप्रधान समाजाचे वैशिष्ठ्यच जणू. असे पुरुष नेहमीच म्हणत असतात की, ’आमच्या घरात आम्ही स्त्रियांना स्वातंत्र्य दिलं आहे बरं का! ’ नमूद करण्याची गोष्ट म्हणजे फक्त पुरुष हेच पुरुषप्रधान संस्कृतीचे घटक नसतात, तर या पुरुषप्रधान संस्कृतीला बळकट करणारा प्रत्येक घटक हा पुरुषप्रधानच असतो. म्हणूनच स्त्रियासुद्धा पुरुषप्रधान वृत्तीच्या असू शकतात. स्त्रियांचा लढा, त्यांचे प्रश्न याकडे केवळ स्त्रीवादी दृष्टिकोनातून न पाहता मानवतावादी दृष्टीने पाहिले तरच शोषण थांबून खरी समानता प्रस्थापित होईल. आज मात्र कळप-समूह-समाज ही आजवरची कालसंक्रमणा विसरून उलट दिशेने भूक आणि वासना या आदिम प्रेरणेपर्यंत आपण प्रवास करतो आहोत, असे सद्यस्थितीवरून वाटते. बाहेरच्या रावणाची भीती घालून स्त्रीसाठी परंपरेच्या लक्ष्मण रेषा आखल्या गेल्या. मातृत्वाचे गोडवे व अन्नपूर्णेचे वरदान यांच्या अवाजवी महतीने तिला चूल व मूल यामध्येच आजन्म कैद केले. संसाराच्या गाभाऱ्यात एकदा प्रतिष्ठापना झाली की तिने आयुष्यभर देवपण ‘सोसायचं’ हा दंडकच झाला. तिची देवता म्हणून पूजा करण्याऐवजी, माणूस म्हणून आदर केला तर तिच्या अस्तित्वाला खरा अर्थ येईल.

आपल्याकडे आदर्श पुरुष व आदर्श स्त्री यांच्या संकल्पना अगदी विरोधाभास दाखवणाऱ्या आहेत. ज्या पुरुषाकडे नेतृत्व कौशल्य आहे, आत्मविश्वास, धडाडी आहे तो आदर्श पुरुष व स्त्री मात्र खाली मान घालून जगणारी, वडीलधाऱ्यांचे ऐकणारी, कुटुंबासाठी खपणारी ती आदर्श. मुळात ही संकल्पनाच स्त्री-पुरुष समानतेला सुरुंग लावणारी आहे. म्हणून समाजाच्या मानसिकतेत बदल होणे महत्त्वाचे आहे. जोपर्यंत मानसिकता बदलत नाही तोपर्यंत समानता प्रत्यक्षात येणे अवघड आहे. समानता म्हणजे दोघांनी एकमेकांच्या प्रगतीसाठी पोषक वातावरणनिर्मितीचा प्रयत्न करणे व निर्भेळ सहजीवन अनुभवणे. प्रत्येक स्त्री-पुरुषाने असे करण्याचा प्रयत्न केला तर खऱ्या अर्थाने समानता अस्तित्वात येईल.

पण आजपर्यंत स्त्रीमध्ये लख्खपणे दुय्यमत्वाची जाणीव रुजवण्यासाठी पुरुषसत्ताक पद्धतीने तिच्यावर कौटुंबिक, सामाजिक, धार्मिक संस्कार लहानपणापासून असे केले आहेत की, त्यात परावलंबीत्वाची भावना, असहाय्यतेची भावना वाटूच नये. शारीरिक सौंदर्य, कपड्याचे महत्त्व यातच त्या गुंतून राहाव्यात आणि शारीरिक क्षमतेकडे, तिच्या बौद्धिक विकासाकडे जाणूनबुजून तिला दुर्लक्ष करण्यास भाग पाडावे. तसेच तिला फक्त लैंगिक देहधर्मात जखडून ठेवावे. अशाप्रकारे संस्कृती नामक सोन्याच्या पिंजऱ्यात स्त्रीला जखडून ठेवले आहे. त्यामुळे स्त्री अबला नसूनही तिला अबला बनवले गेले आहे. पुरुषांमध्ये रुजवले जाणारे स्वातंत्र्य, निर्णय क्षमता, तर्कनिष्ठता, आत्मविश्वास हे गुण स्त्रीमध्ये संस्काराच्या रूपाने कधी रुजवले जात नाहीत. त्या उलट प्रत्येक स्त्रीला स्वयंपाक करता आलाच पाहिजे. विणकाम, भरतकामात रस वाटलाच पाहिजे. मातृत्वाची ओढ तर अनिवार्यच आहे. त्यामुळे तिने घरकाम, स्वयंपाक, आलेगेले, नातेवाईक, सासू-सासरे, आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे पतीदेव यांची सेवा, त्याग, प्रेम या गोष्टी अंगी बाणवल्या पाहिजेत, असे संस्कार केले जातात.

स्त्री-पुरुषांमधील नैसर्गिक फरकांना, शारीरिक, मानसिक क्षमतांना चुकीच्या पद्धतीने मांडून त्यांच्या सामाजिक स्तरामध्ये पुरुषी वृत्तीने दरी निर्माण केली आहे, हे लक्षात घेऊन २१ व्या शतकातील शिक्षित तरुणींनो, आता तरी पुरुषी मानसिकतेचा हा कावा लक्षात घेऊन त्यावर मात करण्यासाठी तुम्ही जिद्दीने उभ्या राहाल काय? लग्न, परावलंबन, मातृत्व, मुलांचे संगोपन, स्वयंपाकपाणी आणि घरकाम या स्त्रियांच्या गुलामगिरीच्या बेड्या आहेत, हे कधीतरी तुमच्या लक्षात येईल काय? ही कामे फक्त स्त्रियांचीच आहेत असे कोणी ठरवले, हा प्रश्न तुमच्या मनात का येत नाही? तेव्हा स्वतःमधील आंतरिक शक्ती ओळखून आपल्या मुलांमध्ये, स्त्री ही एक व्यक्ती आहे, तिलाही पुरुषासारखे मन असते, तीही पुरुषाएवढीच हरप्रकारे सक्षम आहे, असा स्त्री-पुरुष समानतेचा संस्कार रुजवून भावी पिढीतील पुरुषाचा स्त्रीकडे पाहण्याचा दृष्टिकोन त्यांना बदलण्यास भाग पाडाल काय? तसे झाले तर पुरुषही लग्न हा मालकी हक्काचा संस्कार नसून सहजीवनाचा सत्कार आहे हे लक्षात घेऊ लागतील.

 – समाप्त –

© श्री जगदीश काबरे

(लेखक विज्ञान प्रसारक आहेत.)

jetjagdish@gmail. com

मो ९९२०१९७६८०

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “लग्न आहे सहजीवन…” – भाग १ ☆ श्री जगदीश काबरे ☆

श्री जगदीश काबरे

☆ “लग्न आहे सहजीवन…” – भाग १ ☆ श्री जगदीश काबरे ☆

१) अमोल आणि मृणाल, दोघंही शिक्षित, शहरी मध्यमवर्गातले. दोघंही कॉर्पोरेट नोकरीत असून चांगल्या पगाराच्या बळावर त्यांनी स्वतंत्र घर घेतलं. लग्नाच्या सुरुवातीला दोघंही समानतेची भाषा बोलणारे, फसव्या पद्धतीने ‘लिबरल’ भासणारे. पण काही वर्षांत मृणालला जाणवायला लागलं की अमोलच्या या आधुनिकतेच्या कवचाखाली पारंपरिक पुरुषी वर्चस्व लपलेलं आहे. घरातील छोट्या निर्णयांपासून मोठ्या गुंतवणुकीपर्यंत, अमोल आपली मर्जी लादायचा. मृणालचं मत विचारात घेतल्याचा आभास असायचा, पण शेवटचा निर्णय ‘अमोलचा’च असायचा.

कधी कधी मृणालला वाटायचं की अमोलला स्त्री सक्षमीकरणावरच संशय आहे. जेव्हा ती प्रमोशन मिळवून त्याच्याहून अधिक पगार घेऊ लागली, तेव्हा अमोल काही बोलला नाही—पण त्याचं शांत राहणंही एक प्रकारचं अबोल बंड होतं. त्याचा आत्मविश्वास गडगडायला लागला होता. तिच्याशी त्याचा संवाद कमी होत गेला. ही दुरी केवळ मनाची नव्हती, तर शरीराचीही झाली होती. अमोलला स्वतःच्या आतली कोंडी जाणवायची, पण त्याला शब्द सापडायचे नाहीत. ऑफिसमध्ये बॉसकडून पडणाऱ्या ओरड्यानंतरही तो घरी येऊन ‘सर्व काही ठीक आहे’ असा चेहरा ठेवायचा. रडणं त्याला लाजिरवाणं वाटायचं. ‘पुरुष रडत नाहीत’ हेच त्याचं ब्रीद होतं. आणि त्याच ब्रीदामुळे तो हळूहळू मृणालपासून तुटत गेला. मृणाल अनेकदा संवाद साधायचा प्रयत्न करायची. तिला केवळ ‘सहवास’ नको होता, तर ‘सहजीवन’ हवं होतं. पण अमोलच्या पुरुषत्वाने तिच्या आवाजाला स्पेस दिलीच नाही. एक दिवस तिने थेट सांगितलं, “तुझा पुरुषी माज मला बोचतोय. तुझं अबोलपण हा माझ्यावर मूक अन्याय करतोय. ” त्या रात्रीनंतर अमोल पहिल्यांदा स्वतःशी प्रामाणिक राहून विचार करू लागला. त्याने मानसोपचारतज्ज्ञांची भेट घेतली. त्याला समजलं की त्याचं पुरुषपण त्याच्यासाठीही तुरुंग ठरलं आहे. त्यानं संवाद साधायला शिकायचं ठरवलं. आता दोघंही एकत्र जोडीनं ‘सहजीवन’ या कल्पनेचा नव्यानं अर्थ शोधू लागले आहेत.

२) धोंडू हा विदर्भातला एक शेतकरी. त्याचं शिक्षण जेमतेम, पण समाजात प्रतिष्ठा टिकवण्यासाठी तो बायकोला कायम ‘दुसऱ्या क्रमांकाची माणूस’ मानतो. सौदामिनी ही सुशिक्षित, पण सासरी आल्यावर तिचं शिक्षण ‘घर सांभाळण्यापुरतं’ मर्यादित झालं. धोंडू कधीच तिच्या मताला किंमत देत नाही. तिने बँकेत नोकरी करावी, घराला हातभार लावावा हे तिचं स्वप्न आहे. पण धोंडूचं उत्तर एकच — “बाई माणूस बाहेर नको. ” ही पुरुषी वृत्ती धोंडूला ‘पुरुष’पणाचं आभास देत राहते. परिणामी तो भावनिकदृष्ट्या कोरडा, एकटा होतो. त्याच्या या वृत्तीमुळे सौदामिनीने घरातच संवादाचं दार बंद केल्यावर त्याला समजतं की, ‘पुरुष’ असणं म्हणजे माणूसपण गमावणं आहे. तिच्या दूर जाण्याने तो स्वतःला प्रश्न विचारतो, पण तोवर खूप उशीर झालेला असतो. त्यांच्या जीवनात संवाद, समानतेची वाट सापडत नाही, आणि ते केवळ नावापुरतं नातं उरतं.

३) रोहन आणि नेहा, दोघंही अमेरिकेहून परतलेले, मुंबईत स्थायिक. दोघांचं शिक्षण, राहणीमान आणि विचार प्रदेशात राहिल्यामुळे आधुनिक झाले होते असं म्हणणं धाडसाचंच ठरलं असतं. कारण रोहनच्या वागण्यात अजूनही सूक्ष्म पुरुषसत्ताक वर्तन शिल्लक राहिलं होतं. जेव्हा नेहा तिच्या संशोधनात आंतरराष्ट्रीय प्रसिद्धी मिळवते, तेव्हा रोहन हसून तिचं कौतुक करतो. पण आतून मात्र पुरुषी अहंकाराला ठेच बसल्यामुळे तो अस्वस्थ होतो. तिच्या सन्मानप्राप्त लेखावर ‘बायकोची उपलब्धी’ म्हणून इंस्टाग्राम पोस्ट करतो, पण घरी “माझ्या नोकरीला तुझ्या पेक्षा महत्त्वाचं समज” असं वारंवार बजावतो. नेहाचं बोलणं तो मधेच तोडतो, तिच्या वेळेचा आदर करत नाही, आणि स्वतःला घरात निर्णयकर्ता मानतो. ‘इक्वल पार्टनर’ ही भाषा केवळ फेसबुकपुरती राहते. नातं शारीरिकदृष्ट्या जवळ पण मानसिकदृष्ट्या दूर होतं. हळूहळू नेहा थकते. तिचं मन तोडणाऱ्या पुरुषी वागणुकीला ती ‘मेक्सिकोमध्ये झालेल्या एका चर्चेत’ आवाज फोडते. ती रोहनला थेट विचारते, “तू माझा नवरा आहेस की बॉस? ” हा प्रश्न त्याच्या पुरुषत्वाला हादरा देतो. यथावकाश दोघं थेरपी घेतात. यातून रोहनच्या मनात असलेली पुरुषपणाची झाकलेली पितृसत्ता उघड होते. मग तो मानसोपचार तज्ञाकडून समुपदेशन घेत स्वतःला बदलण्याचा प्रयत्न करतो. हा सकारात्मक बदल नेहाला सुखावतो.

४) अर्जुन आणि समीर हे समलैंगिक जोडपं असतं, पण त्यातही एकात‘पुरुषी’ होण्याची स्पर्धा आहे. अर्जुन अधिक मर्दानी दिसणारा, व्यायाम करणारा, आर्थिकदृष्ट्या वरचढ. त्याला वाटतं, तोच निर्णय घेणारा असावा. तो समीरला अनेकदा ‘थोडं मॅनली हो’ म्हणतो, त्याच्या भावनिक गरजा उडवून लावतो. त्याच्या मते ‘बायल्यासारखा काय वागतोस’ हे म्हणणं सामान्य आहे. हे बघून समीर अनेकदा गप्प बसतो. पण त्याच्या अस्वस्थतेने नातं कमकुवत होतं. LGBTQ+ समुदायामध्येही पितृसत्ताकतेचं पुनरुत्पादन पुरुषपणाच्या द्वारे होत आहे, हे यातून स्पष्ट होतं. एका गटात समानतेसाठी लढताना, त्या गटातही वर्चस्ववादी पुरुषत्व पुन्हा उगवतं. सहजीवनात हळूहळू समीरचं मन अर्जुनपासून दुरावतं. मग अर्जुनला उमगतं की त्याचं ‘अल्फा’पण केवळ भौतिक आहे, प्रेममधील माणुसकी त्याने हरवली आहे.

५) विठोबा, ७२ वर्षांचा. पत्नी काही वर्षांपूर्वी गेली. मुलगा परदेशात. गावाकडे राहतो. आयुष्यभर त्याने ‘पुरुष म्हणलं की कठोर असावं’ हेच घोकलं. बायकोचं बोलणं कधी ऐकलं नाही. ती मन दुखावून शांत बसायची. तो ‘बायकांचं काही असं नसतं’ असं म्हणायचा. आता एकटेपणात त्याला आठवतं की, बायकोने कधीतरी सांगितलं होतं की, ’तुझं मन मला कधीच उघडलं नाही. ” तो दिवसेंदिवस अधिक शांत आणि अधिक एकलकोंडा होत जातो. गावातील किशोरवयीन पोरांमध्ये एखादा हळवा संवाद ऐकला की, त्याचे डोळे पाणावतात. आता त्याला जाणवतं की सहजीवन म्हणजे केवळ संगत नव्हे, तर संगतीत आपलं मन उघडणंही असतं. पण हे उमगायला त्याला सत्तर वर्षं लागली.

मित्रांनो, वरील सर्व उदाहरणं भिन्न सामाजिक गटांतील असली तरी त्यातील पुरुषी वृत्तीमुळे एकाच मातीतील आहेत… पितृसत्ताक शिकवण, भावनिक अभाव, संवादाचा आळस आणि वर्चस्वाची सवय. हीच वृत्ती सहजीवनाला हळूहळू पोखरत नेते. संवादाऐवजी आदेश, सामायिकतेऐवजी मालकी, सहजीवनाऐवजी सत्ता या गोष्टी जेव्हा नात्यात शिरतात तेव्हा प्रेम दमते, जिव्हाळा तुटतो, आणि माणसं हरवतात. सहजीवन टिकवण्यासाठी प्रत्येक पुरुषाने ‘पुरुष’ होण्याच्या संकल्पनेवर नव्याने विचार करायला हवा. फक्त पायघोळ, हुकमी बोलणं, वा आर्थिक जबाबदारीनं पुरुष होणं पुरेसं नाही; तर आपल्या जोडीदाराच्या आत्म्याशी नातं जोडणं, तिच्या समोर हळव्या क्षणातही उभं राहणं हे खरे पुरुषपण ठरावे लागेल. वरील उदाहरणातून दिसून येतं की पुरुषी वृत्तीने पुरुषालाही तणावाच्या गर्तेत ढकललं आहे. समाजाने पुरुषपणाची चौकट एवढी अरुंद करून ठेवली आहे की, त्यात माणूस मावत नाही आणि स्त्रीला तर त्यात श्वास घेणं अशक्य होतं. सहजीवन यशस्वी होण्यासाठी केवळ प्रेम, जबाबदारी आणि सोबती पुरेसे नसतात, तर समतेची जाणीव, भावनिक परिपक्वता, आणि संवादाची क्षमता लागते. पुरुषाने स्वतःच्या आत डोकावून पाहिलं, तर सहजीवनचं वळण अधिक सुसह्य आणि सहानुभूतीशील होण्यासाठी त्याला त्याची पुरुषी मानसिकता सोडून स्त्रीकडे आपल्यासारखीच एक व्यक्ती म्हणून पहायची गरज आहे.

निसर्गात कोणतीही गोष्ट साचून राहिली की सडते. प्रवाहीपणा, बदल हा निसर्गाचा नियम आहे. पण आपली जातिसंस्था, कुटुंबसंस्था, विवाहसंस्था समाजातील रूढी परंपरा गतकालानुगतिक जशाच्या तशा आहेत त्यामुळे आतल्या आत सडत आहेत. काळ बदलला तसे संदर्भही बदलले. या सर्वामध्ये बदल करून बदलत्या समाजरचनेप्रमाणे सुटसुटीत प्रवाहित होत काळानुरूप जगण्याची गरज आहे. म्हणूनच पुरुषी वर्चस्व झुगारून देण्याची सुरुवात कुटुंबातील स्त्रियांनाच करावी लागेल. वैचारिक दुर्बलता मागे टाकून प्रगतीची उत्तुंग झेप घेण्यासाठी योनिशुचितेचे अवडंबर दूर करून नैसर्गिकतेने जगणे आवश्यक आहे. बलात्कारासारखी एखादी घटना घडली तर तो अपघात समजून योनिशुचितेला महत्त्व न देता सहजपणे इतर दुर्घटनांप्रमाणे त्याकडे बघावे. अर्थात त्यासाठी मानसिक तयारी करणे आवश्यक आहे. पण आजच्या आधुनिक काळातही आपल्या समाजात स्त्रीची समानता आभासीच आहे. जी काही थोडीफार समता व स्वातंत्र्य स्त्रीला दिलेले दिसते, ते शिक्षणाने आलेल्या समाजभानामुळे, स्त्रीला झालेल्या तिच्या मानवी हक्कांच्या जाणिवेमुळे व कायद्यामुळे आणि एकंदर जगातच वाहणाऱ्या स्वातंत्र्य, समता इत्यादी तत्त्वांच्या विचारप्रवाहामुळे. परंतु मुळात जाऊन पाहिले तर सरंजामी वृत्तीतून येणारी पुरुषी वर्चस्वाची मानसिकता व त्यातून निपजणारी विवेकहीनता बदललेली नाही. उलट अंत:करण हेलावून टाकणाऱ्या प्रसंगी ती वाढलेलीच दिसते आणि तिने नृशंस हिंसेचे रूपही घेतलेले दिसते. कारण अजूनही भारतीय पुरुषाच्या मानसिकतेत मनुस्मृतीतील… स्त्री ही व्यभिचारी असते, स्त्रीला स्वातंत्र्य देणे धोक्याचे असते, स्त्री ही पुरुषाला मोहात पाडणारी असते, अशी स्त्रीला कमी लेखणारी वचने आणि गुरुचरित्रात पतीला उलट उत्तर देणारी स्त्री पुढच्या जन्मी कुत्री होते, परपुरुषाकडे तिची नजर जरी गेली तर ती पुढच्या जन्मी डुक्करीण होते, स्त्रीचे जर घराबाहेर लक्ष गेले तर ती पुढच्या जन्मी घुबड होते, अशी पतिव्रतेची कर्तव्ये सांगून तिच्यावर पुरुषाच्या बंधनात राहण्यासाठी दिलेली वचने याचे गारुड आहे.

क्रमशः…

© श्री जगदीश काबरे

(लेखक विज्ञान प्रसारक आहेत.)

jetjagdish@gmail. com

मो ९९२०१९७६८०

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ मला समजलेली संत तुकारामांची गाथा… भाग – २… ☆ सुश्री अरुणा मुल्हेरकर ☆

सुश्री अरुणा मुल्हेरकर

? विविधा ?

☆ मला समजलेली संत तुकारामांची गाथा… भाग – २ ☆ सुश्री अरुणा मुल्हेरकर ☆

 परमेश्वराची भक्ती करताना प्रथम आवश्यक गोष्ट कोणती असेल तर मनाची शांतता. चित्त शांत असल्याशिवाय परमेश्वराच्या चरणाशी ते लीन होणे कदापि शक्य नाही असे तुकाराम महाराज साधकांना त्यांच्या अभंगांतून वारंवार सांगतात.

 शांती परते नाही सुख। येर अवघेची दुःख।।

 म्हणून शांती धरा। उतराल पैलतीरा।।

 खवळलीया काम क्रोधी। अंगी भरती आधी व्याधी।।

 तुका म्हणे त्रिविध ताप। मग जाती आपोआप।।

चित्ताची शांती ही फार मोठी सिद्धी आहे असे तुकाराम महाराजांचे म्हणणे आहे. सर्व सुखे तेथेच आहेत, बाकी सर्वत्र दुःख आहे. म्हणून शांती धराल तरच संसार सागर पार कराल असे ते साधकांना सांगतात. एकदा का देहात, मनात, शांती स्थिर झाली की त्रिविध ताप (अध्यात्मिक, आधी दैविक, आधी भौतिक) या देहातून निघून जातील.

भक्त आणि परमेश्वर या दोघांचे नाते निव्वळ प्रेमाचे असते. त्यावेळी भक्ताचे कुळ किंवा त्यातील दोषांकडे देव कधीच पाहत नाही. देव आणि भक्त यांच्यातील प्रेम भाव महाराज सामान्य जनांना उदाहरणे देऊन सांगतात.

 गंधर्व अग्नी सोम भोगिती कुमारी।

 कोठे चराचरी त्याग केला त्याग केला।।

 गायत्री स्वमुखे भक्षितसे मळ।

 मिळाल्या वोहोळ गंगा ओघ।।

 कागाचिया विष्ठे जन्म पिंपळासी।

 पांडव कुळासी पाहता दोष।।

 शकुंतला सुत कर्ण शृंगी व्यास।।

 यांच्या नामे नाश पातकांसी।।

 गणिका अजामेळ कुब्जा तो विदुर।।

 पहा पहा विचार पिंगळेचा

 वाल्हा विश्वामित्र वशिष्ठ नारद।।

 यांचे पर्व शुद्ध काय आहे।।

 न व्हावी ती करमे झाली नरनारी।।

 अनुतापे हरी स्मरता मुक्त।।

 शुद्ध अशुद्धतेबद्दल किती गैरसमज आहेत ते निदर्शनास आणून देताना तुकाराम महाराज म्हणतात की शास्त्रामध्ये आठ वर्षांची मुलगी लग्नाला योग्य असते. पण त्या मर्यादेपर्यंत तिला दोन वर्षे गंधर्व, दोन वर्षे अग्नी, दोन वर्षे सूर्य व दोन वर्षे चंद्र भोगतो. अशी आठ वर्षे झाल्यावर तिची लग्नाची तयारी होते. त्यावेळी तिने आधी चार देवांशी व्यभिचार केला आहे, म्हणून तिला वरणाऱ्याने त्यागले काय?

 गाय आपल्या तोंडाने विष्ठा खाते, गंगेला मिळण्यापूर्वी ओढे मलीन असतात, वड आणि पिंपळ कावळ्याच्या विष्ठेतून रुजतात, पांडवांचे कुळ पाहिले तर ते पाच देवांपासून जन्मले आणि त्या पाचांची एकच पत्नी होती. विश्वामित्र मेनकेच्या व्यभिचारातून शकुंतले चा जन्म झाला. शृंगऋषी हरिणीपासून व व्यास ऋषी कोळणी पासून जन्मले. असे जरी असले तरी एका हरीच्या नामाने सर्व पातकांचा नाश होतो. या स्त्री-पुरुषांना जरी कुलदोष चिकटलेले असले तरी त्यांनी अनुतापाने हरीचे स्मरण केले म्हणून ते शुद्ध मानले गेले. यांचे पूर्वकूळ देव सुद्धा मनात आणित नाहीत.

 क्रमशः… २  

© सुश्री अरुणा मुल्हेरकर 

डेट्राॅईट (मिशिगन) यू.एस्.ए.

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ तो आणि मी…! – भाग ८६ ☆ श्री अरविंद लिमये ☆

श्री अरविंद लिमये

? विविधा ?

☆ तो आणि मी…! – भाग ८६ ☆ श्री अरविंद लिमये ☆

(पूर्वसूत्र- नाईक सरांची अचानक झालेली ही भेट वर वर पहाता योगायोगाने घडलेल्या एखाद्या घटनेसारखी वाटली तरी प्रत्यक्षात ती तशी नव्हती. ती भेट लवकरच मला अमूल्य असं कांही देण्यासाठी एक निमित्त ठरणार होती हे मला तेव्हा माहित नव्हतं एवढंच!)

सरांशी झालेल्या भेटीच्या वेळी एखाद्या विकएण्डला मी देशपांडेंकडे जायचं असं ठरलं होतं. त्यानंतर काही दिवसांनी बऱ्यापैकी वेळ होता म्हणून मी राजू/नितीनना फोन केला आणि आज तुम्हाला सोयीचे असेल तर माझा दुपारनंतर येऊन जायचा विचार आहे एरवी पुन्हा कधीतरी असं सांगितलं.

” जरूर या. आज आम्ही घरीच आहोत. ” राजू अगत्याने म्हणाली, ” हो आणि येताना तुमच्या कथांची कात्रणं जमलं तर घेऊन या. ” असंही सांगितलंन.

” कथांची कात्रणं? कां गं? कशासाठी? “मी न समजून विचारलं. ”

“परवा तुम्ही इथून गेल्यानंतर नानांनी आमच्या ‘चिरानी प्रकाशन’ तर्फे तुमचा कथासंग्रह प्रकाशित करा असं आवर्जून सुचवलं होतं. आज अनायसे येताच आहात तर त्या कथांची कात्रणंही घेऊन या. ” राजू म्हणाली.

मला हे अनपेक्षित होतं.

पण मला ते सहजासहजी स्विकारावंसं वाटेना. मुख्य म्हणजे मी आजवर केलेलं कथालेखन स्वान्तसुखायच तर होतं. केवळ एखादा अनुभव मनाला भिडला किंवा चांगला कथा विषय सुचला की लगेच लिहायला वेळ मिळायचाच नाही आणि वेळ मिळेल तेव्हा निवांत लिहू म्हंटलं तरी ते बऱ्याचदा जमायचंही नाही. मग लेखनाला थोडीफार तरी नियमितता यावी या विचाराने मी चांगल्या चांगल्या मासिकांच्या कथालेखन स्पर्धांना कथा लिहून पाठवायचं ठरवलं. त्यानिमित्ताने लेखन सराव रहावा एवढाच उद्देश होता. अनेक कथांना स्पर्धा पुरस्कार मिळत गेले, कथा आवडल्याची वाचक पत्रे येऊ लागली हाच आनंद माझ्यासाठी पुरेसा होता. त्यामुळे कथा साठत जातील तसे त्यांचे कथासंग्रह प्रकाशित होण्यासाठी आवर्जून प्रयत्न करावेत असं मला कधीच वाटलं नव्हतं. बॅंकेच्या कामाचे व्याप आणि जबाबदाऱ्याच एवढ्या होत्या कीं मनात नेहमी त्याचेच विचार गर्दी करायचे. त्यामुळे कथा लिहून झाली कीं मनाचा तो कप्पा लगेच आपोआपच बंद व्हायचा!

पण योगायोगच असा की कांही वर्षांपूर्वी नाईक सरांनीच पाठपुरावा करून महाराष्ट्र राज्य साहित्य-संस्कृती महामंडळाच्या अनुदान योजनेतून माझा ‘जगावेगळी’ हा पहिला कथासंग्रह प्रसिद्ध होईपर्यंत सातत्याने आग्रह, मार्गदर्शन आणि प्रयत्न करीत मला प्रोत्साहित केलं होतं. आणि आता या दुसऱ्या संग्रहाचं नियोजनही त्यांच्याच पुढाकाराने सुरू होणार होतं!!

सरांचा माझ्यावर लोभ होता हे खरंच, पण यावेळी सरांचा हा प्रस्ताव मला सहजासहजी स्वीकारता येईना. त्यादिवशी मी जाताना कथांची फाईल घेऊन गेलो पण ती देताना अतिशय मोकळेपणानं मी त्या दोघांनाही हेच सांगितलं होतं.

“सरांच्या मनात माझ्या बद्दल असलेल्या सद्भावनांमुळेच तुम्हाला त्यांनी हे सुचवलेलं असणार नक्कीच. म्हणूनच मला मनापासून एक सांगावसं वाटतं. तुम्ही दोघेही लेखक आहात, साहित्यप्रेमी आहात, आणि रसिक वाचकही! तुम्ही दोघांनीही या कथा वाचून कथासंग्रह प्रकाशित करायच्या दृष्टीने तुम्हाला त्या आवडतायत कां योग्य वाटतात कां ते पहा. मगच पुढे काय करायचं ते आपण ठरवूया. सर म्हणाले म्हणून घाई गडबडीने कांही नको करायला. ” ते दोघेही हसून ‘बरं’ म्हणाले. त्यांच्या हसण्याचा अर्थ मला पुढे त्यांच्याकडून कथांचं डीटीपी सुरू झाल्याचं कळलं तेव्हाच समजला. प्रूफ रिडिंग मी स्वतः करायची तयारी दाखवली तेव्हाही राजू हसून ‘चालेल’ म्हणाली. डीटीपी तिने स्वत:च केलेलं होतं. प्रूफरिडींग मी दर शनिवार-रविवार त्यांच्याकडे जाऊन पूर्ण केलं खरं पण विशेष कौतुक म्हणजे किरकोळ अपवाद वगळता त्यात कांहीच चुका नव्हत्या. तो कथासंग्रह प्रकाशित होईपर्यंत प्रत्येक टप्प्यावर असं अतिशय मनापासून आणि हसतमुखाने दिलेलं राजू आणि नितीन यांचं योगदान खरोखरच कौतुकास्पद होतं! त्या दोघांची ही कामाची पद्धत आणि त्यांचं साहित्यप्रेम माझ्या दृष्टीने आदर्श म्हणावं असंच होतं!

त्या कथासंग्रहाला प्रस्तावना कुणाची घ्यायची असा विषय निघाला तेव्हा मी अतिशय मनापासून भ. रा. नाईक सरांचंच नाव घेतलं होतं. पण तरीही त्या दोघांनी ‘साप्ताहिक सकाळ’ चे त्यावेळचे संपादक श्री. ‘सदा डुम्बरे’ यांचं नाव सुचवलं!

“या संग्रहातील बऱ्याच कथा ‘साप्ताहिक सकाळ’ कथा स्पर्धेतील विजेत्या कथा आहेत. त्यामुळे आधी ‘सदा डुम्बरे’ सरांनाच विचारूया ” राजू म्हणाली होती.

ते योग्यही होतं. पण त्यांची वेळ घेऊन त्यांना भेटणं, त्यांनी संमती देणं, त्यांच्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून प्रस्तावित संग्रहातील सर्व कथा त्यांनी वाचणं आणि प्रस्तावना लिहून देणं हे सगळंच मला अशक्यप्रायच वाटू लागलं!

” मी फोन करून त्यांची अपॉइंटमेंट घेईन. ते काय म्हणतात ही पुढची गोष्ट. प्रयत्न तरी करू. ” राजू म्हणाली. आणि पुढे आठवड्याभरातच “मी त्यांची भेट घेऊन त्यांना आपला मनोदय सांगितला. त्यांनी लगेच होकारही दिलाय. मी कथांची फाईल घेऊनच गेले होते. ती त्यांना वाचायला देऊन आलेय. सदा डुम्बरेसर तुम्हाला ओळखतात म्हणाले. ” असंही तिने सांगितलं.

सदा डुम्बरे सर मला ओळखतायत हे समजलं तेव्हा कथास्पर्धांमधील माझ्या कथांमुळे ते फक्त नावानेच ओळखत असणार असंच मला वाटलं पण ते तेवढंच नव्हतं! जेव्हा त्यांनी दिलेल्या सहकार्याबद्दल मी आवर्जून ‘धन्यवाद’ द्यायला त्यांना फोन केला तेव्हा त्यांनी माझ्या संदर्भातल्या एका प्रसंगाची खूप जुनी अशी एक आठवण आवर्जून मला करून दिली, तेव्हा मी आश्चर्याने थक्क होऊन गेलो! एखाद्याबद्दलची कृतज्ञता योग्य वेळी मनापासून बोलून दाखवण्यातला त्यांचा मोठेपणा खरंच अपवादात्मक असाच. त्यांनी मला आठवण करून दिलेली माझ्या संदर्भातली ती घटना माझ्या दृष्टीने तशी एक साधीच घटना होती. पण तरीही ती त्यांनी इतकी वर्षं उलटून गेल्यानंतरसुद्धा माझ्या नावासकट लक्षात ठेवावी हे आश्चर्य वाटावं असंच होतं!

लिहिण्याच्या ओघात त्या घटनेचा संदर्भ आलाच आहे तर ती घटनाही आवर्जून सांगणं मला अगत्याचं वाटतं. कारण ती घटनाच आज डुम्बरे सरांचं मोठेपण अधोरेखित करायला निमित्त ठरलेली आहे! मी आधी उल्लेख केल्याप्रमाणे ही तेव्हापासून सहा सात वर्षे आधीची घटना. मी कथालेखन स्पर्धेसाठी ‘साप्ताहिक सकाळ’ साठी पाठवलेली एक कथा वेळेत पोहोचू शकली नव्हती त्यामुळे स्पर्धेसाठी तिचा विचार झालेला नव्हता. पुढच्या वर्षी तीच कथा मी ‘साप्ताहिक सकाळ कथालेखन स्पर्धे’साठी पुन्हा पाठवली. सुदैवाने त्याच कथेला त्यावर्षी पहिल्या नंबरचा पुरस्कारही जाहीर झाला. तसे त्यांचे पत्रही मला मिळाले. तरीही त्या कथास्पर्धेचा सविस्तर निकाल पहाता यावा म्हणून मी एका पेपरस्टॉल वरून नुकताच प्रकाशित झालेला ‘साप्ताहिक सकाळ’ चा अंक आवर्जून विकत घेतला. आणि तो सहज चाळू लागलो तेव्हा मला धक्काच बसला. कारण त्या अंकात गेल्यावर्षी मी स्पर्धेसाठी पाठवलेली हीच कथा तेव्हा स्पर्धेत समाविष्ट न झाल्याने प्रसिद्धीसाठी मात्र स्वीकारलेली असावी, म्हणूनच ती या आठवड्याच्या अंकात आज प्रसिद्ध झाली होती! पुढच्याच आठवड्यात प्रसिद्ध होऊ घातलेल्या कथा-विशेषांकात यावर्षीची पारितोषिक प्राप्त सर्वोत्तम कथा म्हणूनही हीच कथा अनवधानाने पुन्हा प्रकाशित होणार होती! ते आक्षेपार्ह तर ठरणार होतंच आणि ‘साप्ताहिक सकाळ’च्या प्रतिमेला तडा जायला निमित्तही! अर्थातच डुंबरे सरांची चूक नसूनही मुख्य संपादक म्हणून याची झळ डुंबरे सरांनाही बसणार होतीच. मी त्या अंकातील स़पादक म्हणून दिलेला त्यांचा फोन नंबर पाहून लगेच त्या नंबरवर फोन केला. फोनवर सुदैवाने संपादक सदा डुम्बरे सरच होते. मी त्यांना नेमकी वस्तुस्थिती सविस्तर सांगताच ते अवाक् झाले.

“तुम्ही आज आवर्जून हे सांगितलंत खूप बरं झालं. मी तातडीने यात लक्ष घालतो. ” ते म्हणाले होते.

अर्थातच गुणवत्तेनुसार तयार केलेल्या पारितोषक प्राप्त कथांच्या यादीतल्या माझ्या कथेऐवजी दुसऱ्या कथेला ती संधी मिळणं अपेक्षितच होतं. मुख्य म्हणजे नकळत घडलेली चूक योग्य वेळी दुरुस्त होणंही तितकंच आवश्यकही होतं.

अर्थात हे सगळं याच क्रमाने त्या त्या वेळी घडत गेलं म्हणूनच केवळ फार मोठं अरिष्ट टळलं याचं मला समाधान होतं. प्रत्येक माणसांप्रमाणेच प्रत्येक कथाही आपापलं प्राक्तन घेऊनच जन्माला येत असते याचं एक लेखक म्हणून मला आलेलं ते प्रत्यंतरच होतं!

तीच कथा आता प्रकाशित होऊ घातलेल्या माझ्या ‘स्पर्श प्रकाशाचा’ या कथासंग्रहात समाविष्ट असणे आणि ती पुन्हा या संग्रहाला प्रस्तावना लिहिण्यापूर्वी ‘सदा डुम्बरे’ सरांच्याच समोर जाणे हा सुध्दा एक अनोखा योगायोगच होता!

खूप वर्षांपूर्वी घडलेलं हे सगळं मी विसरूनही गेलो होतो. पण या पार्श्वभूमीवर मी डुंबरेसरांना धन्यवाद द्यायला जेव्हा फोन केला तेव्हा माझ्याशी बोलताना त्यांनी याच घटनेची मला आठवण करून दिली आणि आपल्या हातून घडून गेलेली एखादी सकारात्मक गोष्ट सुध्दा नकळत दुसऱ्यासाठी प्रदीर्घकाळ स्मरणीय कशी ठरू शकते याचा सुखद अनुभव मला आला! एरवीही त्यांनी प्रस्तावना लिहायला नकार नसताही दिला पण माझं नाव नजरेसमोर आलेल्या क्षणी त्यांच्या मनात खोलवर रूजलेल्या त्या प्रसंगाच्या माझ्या संदर्भातल्या आठवणीचं त्यांना नेमकं स्मरण होणं आणि त्यांनी त्याचा मोकळेपणाने आवर्जून उल्लेख करणं हा त्यांचा चांगुलपणाच म्हणायला हवा!

नाईक सरांचं फक्त एकदोन दिवसांच्या सवडीनं पुण्यात येणं, त्यांना त्यावेळी माझी नेमकी आठवण होणं, त्यांचं मला आवर्जून फोन करणं, त्यांच्या लेक न् जावयाच्या घरी आमची भेट होणं, त्या दोघांनी नेमकी अलीकडेच त्यांची नवीन प्रकाशन संस्था सुरू केलेली असणं, सरांच्या मनातील माझ्याबद्दल असलेल्या लोभामुळे त्यांना माझा नवीन कथासंग्रह त्या घरच्याच प्रकाशन संस्थेतर्फे प्रकाशित व्हावा असं मनापासून वाटणं, आणि त्यांच्या इच्छेला त्यांच्या लेक जावयानेही अगदी मनापासून प्रतिसाद देणं या एका महिन्याभरातच घडून गेलेल्या सगळ्या अनपेक्षित घटनांचे इतरही अनेक धागेदोरे या कथासंग्रहाच्या प्रकाशन समारंभाशीही आश्चर्यकारकरित्या जोडले जाणार होते आणि ‘त्या’च्या कृपालोभाची अशा अनेक धाग्यादोऱ्यांनी घातली गेलेली वीण माझ्या उर्वरित आयुष्याला एक अनोखी कलाटणी देऊन जाणार होती हे मात्र माझ्या गावीही नव्हतं!

क्रमश:…  (प्रत्येक गुरूवारी)

©️ अरविंद लिमये

सांगली (९८२३७३८२८८)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares