मराठी साहित्य – विविधा ☆ त्या ‘मुलांच्या’ गंधकोषी… ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्री विश्वास देशपांडे

? विविधा ?

☆ त्या ‘मुलांच्या’ गंधकोषी.. ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

काही वर्षांपूर्वी मी अमरावतीच्या शाश्वत स्कूल या शाळेला भेट देण्यासाठी गेलो होतो. तिथे गेल्यानंतर शाळेच्या मुख्याध्यापकांच्या टेबलवर एक बोर्ड होता. त्यावर लिहिले होते Every child is unique. ‘ तारे जमीपर ‘ हा चित्रपट आपल्यापैकी अनेकांनी पाहिला असेल. त्यातील ईशान अवस्थी आठवतो का ? त्याला जेव्हा होस्टेलमध्ये दाखल केले जाते तेव्हा तो अतिशय दुःखी होतो आणि कोणाशीही बोलत नाही कारण तो आपल्या घरापासून आणि आईपासून तुटतो. या ईशानला डिस्लेक्सिया नावाची एक व्याधी आहे. तो b आणि d, 6 आणि 9 यासारख्या गोष्टींमध्ये फरक करू शकत नाही. पण ही व्याधी बुद्धिमत्तेशी संबंधित नाही. अशा मुलांना समजून घेणे जरुरीचे असते. या चित्रपटातील शिक्षकाचे काम आमिर खान या गुणी नटाने केले आहे. तो त्या मुलाला समजून घेतो आणि त्याच्यातील सुप्त गुणांना वाव देतो. त्याला असे आढळून येते की ईशान हा चित्रकलेमध्ये अतिशय प्रगती करू शकेल आणि तो त्याच्या त्या गुणांना प्रोत्साहन देतो. आणि होतेही तसेच. पुढे जी चित्रकला स्पर्धा घेतले जाते, त्यात ईशानच्या चित्राला प्रथम पारितोषिक मिळते. या चित्रपटातील हर बच्चा खास होत आहे हे वाक्य म्हणजे वरील Every child is unique हीच गोष्ट ध्वनीत करते.

पण आम्ही मुलांना शिकवताना नेमकी हीच गोष्ट विसरतो. सगळ्या मुलांना जणू एकाच साच्यात बसवण्याचा प्रयत्न करतो. पण ही मुले वेगवेगळी आहेत, त्यांना प्रत्येकाला वेगळे व्यक्तिमत्व आहे, त्यांची आवड निवड वेगळी असू शकते या गोष्टी आम्ही दुर्लक्षित करतो किंवा सोयीस्कर विसरतो. आम्हाला हवी असते सतत ए ग्रेड किंवा 90% च्या पुढे परीक्षेतील गुण. आम्ही त्यांना रेसचे घोडे बनवतो. पण या सगळ्या खटाटोपात आम्ही त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी प्रोत्साहन देत नाही. त्यांचे बालपण या सगळ्यात खुरटते. या फुलांना नीट उमलायला आम्ही वावच देत नाही ही आजची शोकांतिका आहे.

पक्षी छान उडू शकतात, मासे छान पोहू शकतात, हरणे धावू शकतात. पण हरणांना उडायला सांगता येणार नाही, पक्षांना पोहायला सांगता येणार नाही किंवा माशांना धावायला सांगता येणार नाही कारण प्रत्येकाचे गुणवैशिष्ट्य वेगळे आहे. हीच गोष्ट मुलांच्या बाबतीत सुद्धा आपण लक्षात घ्यायला हवी. एखादा मुलगा उत्तम खेळाडू होऊ शकतो, एखादा उत्तम चित्रकार होऊ शकतो, एखाद्याला गाण्याचे अंग असते. अशा विविध प्रकारच्या क्षमता प्रत्येक मुलाच्या अंगी असू शकतात. एकाच मुलाकडून सर्व गोष्टींची अपेक्षा आपण करू शकत नाही. ज्या परमेश्वराने किंवा निसर्गाने आपल्याला घडवले आहे किंवा जन्म दिला आहे त्याची सुद्धा तशी अपेक्षा नाही.

रवींद्रनाथ टागोर हे थोर शिक्षणतज्ज्ञ होते आणि महान कवी, साहित्यिक. पण त्यांना शिक्षणाची पारंपारिक चौकट मान्य नव्हती. त्यांना स्वतःला देखील लहानपणी शिकताना अशा प्रकारच्या शिक्षणात रस वाटत नव्हता. म्हणूनच तर मोठेपणी त्यांनी त्यांच्या स्वप्नातल्या शाळेची म्हणजेच शांतीनिकेतनची निर्मिती केली. या शाळेत प्रत्येक विद्यार्थ्याला आपल्या आवडीनुसार शिकण्यासाठी वाव दिला गेला. त्यांच्या मते शिकणं हा आयुष्याचा ‘ उत्सव ‘ व्हावा. त्यांचे हात सर्जनशील व्हावेत. पु ल देशपांडे यांच्यासारखा महान लेखक आणि अष्टपैलू व्यक्तिमत्व असलेली व्यक्ती रवींद्रनाथांच्या या शिक्षण पद्धतीने भारावून गेली. त्यांनी रवींद्रनाथांच्या शांतिनिकेतनात अनेक दिवस मुक्काम करून त्यांची शिक्षण पद्धती समजावून घेतली आणि ती वंगचित्रे, रवींद्रनाथ : तीन व्याख्याने यासारख्या पुस्तकातून आपल्यासमोर मांडली.

मुलांना केवळ पुस्तकातील किडे न बनवता त्यांना जीवनाचा सर्व बाजूंनी आनंद घेता यावा अशी दृष्टी विकसित करणे आवश्यक आहे. त्यांच्यात प्रेम आणि नैतिक मूल्ये रुजतील असे वातावरण आपण त्यांना उपलब्ध करून द्यायला हवे. त्यासाठी त्यांच्या स्तरावर जाऊन त्यांना समजून घेतील आणि समजून देतील अशा शिक्षकांची आवश्यकता आहे. म्हणून क्रीडांगणे मुलांच्या गजबजाटाने फुलली पाहिजेत, वाचनालयात मुलांची गर्दी हवी, वर्गामध्ये कठोर शिस्तीच्या ऐवजी हसत खेळत शिकता यायला हवे. अनावश्यक विषयांचे आणि पाठीवरील दप्तराचे ओझे कमी व्हायला हवे. मुलांना शाळेत जाणे ही आनंदाची गोष्ट वाटली पाहिजे ती शिक्षा वाटता कामा नये. हे उगवते तारे आहेत, उमलती फुले आहेत ती कोमेजून जाता कामा नये याची दक्षता आपणच घ्यायला हवी. ही मुले म्हणजे आपले भविष्य आहे. यात पालकांची भूमिका अतिशय महत्त्वाची आहे. आज मुलांना खेळण्यासाठी घरामध्ये भावंडं नाहीत, आजीआजोबा नाहीत. अशा वेळी आई वडिलांनी मुलांसाठी वेळ काढणे आणि त्यांना समजून घेणे, प्रसंगी त्यांच्यामध्ये खेळणे आवश्यक आहे.

वर्षातून केवळ एक दिवस बालदिन साजरा करून भागणार नाही. मुलांच्या चेहऱ्यावरील हास्य, त्यांच्या जीवनातील आनंद कायम राहायला हवा. त्या कळ्या आपल्या पूर्ण शक्तीनिशी उमलायला हव्या. त्या फुलांच्या गंधकोषी असे एक सुंदर गाणे आहे. त्यात कवीला फुलांच्या गंधकोषात परमेश्वराचाच वास आहे असे सुचवायचे आहे. त्यात एका अक्षराचा बदल करून त्या मुलांच्या गंधकोषी असे म्हणता येईल. त्यातही त्या परमेश्वराचा वास आहे. फक्त ही फुले आम्हाला नीट फुलवता आली पाहिजेत. म्हणजे त्यांचा सुगंध दूरवर पोहोचू शकेल.

© श्री विश्वास देशपांडे

चाळीसगाव

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ ‘हे, ही, हाय, हॅलो, नमस्ते, रामराम! अभिवादन – प्रतिअभिवादनाचे शिष्टाचार’ ☆ श्री दिवाकर बुरसे ☆

श्री दिवाकर बुरसे

🌸 विविधा 🌸

☆ ‘हे, ही, हाय, हॅलो, नमस्ते, रामराम! अभिवादन – प्रतिअभिवादनाचे शिष्टाचार’ ☆ श्री दिवाकर बुरसे

🌼

प्रस्तावना:

दिवसभरात प्रथम भेटल्यावर परस्परांना अभिवादन – प्रति अभिवादन करण्याची पद्धत जगभरच्या सर्व देशात, धर्मात, मानवी समूहात, संस्कृतीत गेल्या सहस्रावधी वर्षांपासून पाळली जाते. देश- काल-धर्म – संस्कृतीपरत्वे अभिवादनाच्या रीति -प्रथा – पद्धती- संकेत भिन भिन्न असले तरी त्यामागीत मानवी भावना, शिष्टाचाराच्या संकल्पना सारख्याच आहेत.

अभिवादन म्हणजे आदर, सन्मान, स्नेह व सौहार्द्र व्यक्त करण्याची एक सुंदर पद्धत होय. मानव हा समाजप्रिय प्राणी असल्यामुळे इतरांशी संपर्क साधताना नम्रतेने आणि आदराने वागणे आवश्यक असते. अभिवादन ही सौजन्याची पहिली पायरी आहे.  

अभिवादनाचे प्रकार विविध आहेत. काही लोक शब्दांनी अभिवादन करतात जसे, “नमस्ते”, “नमस्कार”, “ सुप्रभात”, “जय हिंद”, “रामराम” इत्यादी. काही लोक कृतीने अभिवादन करतात, जसे हात जोडणे, वाकून नमस्कार करणे, चरणस्पर्ष करणे, हस्तांदोलन करणे, आलिंगन देणे इ.

विविध धर्मांनुसारही अभिवादनाच्या पद्धती बदलतात, जसे, “सत् श्री अकाल”, “अस्सलामुअलैकुम”, “गॉड ब्लेस यू” इत्यादी. अलिकडे पाश्चात्य संस्कृतीच्या वाढत्या प्रभावामुळे तरुण मंडळी “हे”, ” ही”, “हाय”, “हॅलो” अशा ‘ह’काराने एकमेकांना अभिवादन करताना दिसतात. तरीही भारतात ” नमस्ते” किंवा ” रामराम” हे सुटसुटीत अभिवादन अधिक लोकमान्य आहे.

अभिवादनाचे अनेक लाभ आहेत. यामुळे समाजात सौहार्द्र, प्रेम आणि आदर वाढतो. योग्य अभिवादनाने संभाषणाचा आरंभ चांगला होतो. त्यातून परस्परांतील स्नेहसंबंध दृढ होतात. यामुळे सामाजिक शिस्त राखली जाते, प्रसन्न आनंददायी वातावरण निर्माण होऊन पुढील संवाद ‘सुसंवाद’ होण्यास सहाय्य होते.

म्हणूनच, अभिवादन हा केवळ एक शिष्टाचार नसून, तो आपल्या संस्कृतीचा आणि सभ्यतेचा अभिन्न भाग आहे. प्रत्येकाने इतरांना भेटताना आदरपूर्वक अभिवादन करावे, हीच खरी सामाजिक सौजन्याची खूण आहे.

आपली प्राचिन भारतीय संस्कृती विनय, नम्रता आणि अनुशासन यांवर आधारलेली आहे. या संस्कृतीत अभिवादन म्हणजे केवळ एक सौजन्याचा संकेत नसून ते एक धार्मिक आणि नैतिक कर्तव्य मानले जाते. मनुस्मृती, याज्ञवल्क्य स्मृती, रामायण, महाभारत यासारख्या धर्मशास्त्रग्रंथात अभिवादन कसे करावे, कोणाला करावे त्याचे प्रत्युत्तर कसे द्यावे, याचे सविस्तर मार्गदर्शन शास्त्रकारांनी केलेले आहे.

अगदी बालपणापासून घरात, गुरुकुलात ते मुलांना शिकविले जाई. सार्वजनिक जीवनात त्याचे काटेकोर पालन केले जाई. अशा प्रकारे अभिवादन आणि त्याला दिले जाणारे प्रत्युत्तर ही दोन्ही आचरणे भारतीय संस्कृतीत धर्माचे अविभाज्य घटक आहेत.

अभिवादनाचे महत्त्व – विनयातून धर्म

अभिवादनशीलस्य नित्यं वृद्धोपसेविनः।

चत्वारि तस्य वर्धन्ते – आयुर्विद्या यशो बलम्॥

(मनुस्मृती २. १२१)

या श्लोकात मनुमहाराज सांगतात की, विनम्र अभिवादन करणाऱ्या व्यक्तीचे आयुष्य, विद्या, कीर्ती आणि बळ (सतत) वाढत रहाते. केवळ वयानेच नव्हे, तर विद्या, शील, आणि आचरणाने श्रेष्ठ असलेल्या व्यक्तींना अभिवादन करणे हे धर्माचे पालन आहे.  

कोणाला, कसे अभिवादन करावे?

जात्या वृद्धं गुरुं विद्या-वयो-शील-सम्भवम्।

अभिवादयितव्यं स्यात् पञ्चत्यागं न वै द्विजः॥

(मनुस्मृती २. १२२)

यात पाच प्रकार सांगितले आहेत. जन्म, वय, विद्या, शील, आणि गुरुस्थान. या पाचही गोष्टींचा विचार करून पात्र व्यक्तींना अभिवादन केले पाहिजे. केवळ वय हा एकमेव निकष नाही, तर आचार, विचार व ज्ञान देखील तितकेच महत्त्वाचे आहेत.

प्रतिअभिवादन करण्याचे शिष्टाचार

अभिवादन हे एक द्विपक्षीय सामाजिक धर्मकर्म आहे. ज्याप्रमाणे विनम्रपणे अभिवादन करणे आवश्यक आहे, त्याचप्रमाणे त्याला योग्य, प्रेमपूर्वक आणि योग्य पद्धतीने उत्तर देणेही तितकेच महत्त्वाचे आहे.

प्रत्युत्थानं अभिवादनं सत्क्रियां चानुवर्त्तनम्।

एतान्येवाश्रमाणां स्यात् कृत्यं शुद्धिं च सर्वतः॥

(मनुस्मृती २. १२७)

यामध्ये चार आचरणे सांगितली आहेत:-

१) प्रत्युत्थानम्– उठून प्रतिसाद देणे

२) अभिवादनम् – शब्दांतून नम्र प्रतिसाद

३) सत्क्रिया – सन्मानपूर्वक प्रतिसाद

४) अनुवर्तनम् – आदराने त्या व्यक्तीच्या इच्छेप्रमाणे वागणे 

प्रति अभिवादन करताना योजायचे वाक्यप्रयोग

प्रकार उत्तर

१) ब्रह्मचारी/शिष्य:- “आयुष्मान भव”, “दीर्घायुषी भव”

२) विद्यार्जन करणारा:-     “यशस्वी भव”, “विद्यावान भव”

३) कनिष्ठ/स्नेही:- “शुभं भवतु”, “मंगलं भवतु”, “शिवं कुरु”

४) सामान्य प्रसंग:- प्रसन्न हास्य, सूक्ष्म संकेत, डोळ्यांनी स्नेह प्रकट करणे.  

प्रत्युत्तर देताना वाणी मधुर, प्रसन्न आणि प्रेमळ असावी. अभिवादन – प्रतिअभिवादन हा केवळ शिष्टाचार नाही तर मानवी संबंध सुधारण्याचे ते आद्य आणि अत्यंत महत्वाचे माध्यम आहे.

प्रत्युत्तर न देणे हा दोष

जर कोणी अभिवादन केले आणि त्याला उत्तर दिले गेले नाही, तर ते अहंकाराचे लक्षण मानले जाते. स्मृती सांगतात की तुम्ही केलेल्या अभिवादनाचा स्विकार न करणाऱ्या आणि प्रतिअभिवादन न करणाऱ्या व्यक्तीला, ती व्यक्ती आशिष्ट आहे असे समजून, तिला भविष्यात कधीही अभिवादन करू नये. त्याचे असे आशिष्ट वर्तन नीति व धर्मशास्त्रविरुद्ध आहे. असे वर्तन नातेसंबंधांमध्ये ताण उत्पन्न करू शकते. मनुस्मृतीनुसार, अभिवादनाला प्रतिसाद न देणे हा शिष्टाचारभंग आहे.

विशेष परिस्थितीतील आचरण

जर कोणी ध्यान, पूजा, जप इ. करीत असेल, कोणी रुग्णशय्येवर असेल तर तो प्रतुतर देण्यास असमर्थ असतो. अशावेळी संकेताने किंवा मौनाने प्रतिसाद दिल्यास, तेही योग्य मानले जाते. उत्तर देण्यासाठी स्वच्छता, मानसिक प्रसन्नता आणि नम्रता आवश्यक आहे.  

उपसंहार

अभिवादन आणि त्याला दिले जाणारे उत्तर हे केवळ सामाजिक सौजन्य नसून धार्मिक, नैतिक व आध्यात्मिक उन्नतीचे साधन मानले आहे. या परंपरेतून आपल्याला संस्कार, विनय आणि नम्रता यांचे बाळकडू मिळते.

आजच्या तंत्रज्ञानयुगात जरी नमस्काराच्या, अभिवादनाच्या पद्धती बदलल्या असल्या, तरी त्यामागची भावना, आदर, आणि मानवतेचा गाभा सदासर्वकाळ तसाच जपणे हे आपले कर्तव्य आहे.

वरील विवेचनाच्या पार्श्वभूमीवर आपण घरात, समाजात, सोसायटीत, ऑफीसात, कार्यालयात, उत्सवात, स्नेहसंम्मेलनात कसे वागतो याचा प्रत्येकाने विचार करावा, आत्मपरीक्षण करावे 

शास्त्राने सांगितलेले शिष्टाचार, अभिवादन – प्रति अभिवादनाचे संकेत दुर्लक्षिणे, टाळणे, त्याविषयी निष्काळजीपणा दाखवणे अशा कळत न कळत घडणाऱ्या कृतीतून समाजासमोर आपली कशी प्रतिमा उभी ठाकते याचे आत्मनिरीक्षण प्रत्येकाने अवश्य करावे.

समाजाने आपल्याला ‘एक चांगली, सभ्य, सुसंस्कृत, सज्जन व्यक्ती’ म्हणून ओळखावे अशी अपेक्षा बाळगणाराने वरील अभिवादन – प्रतिअभिवादचे संकेत व शिष्टाचार अवश्य पाळावेत.

अंती येवढेच म्हणता येईल की,

नम्रता हीच खरी विद्वत्तेची ओळख आणि योग्य साद – प्रतिसाद हीच सज्जनता समजावी!

 🙏🏻

© श्री दिवाकर बुरसे

पुणे

संपर्कः ९२८४३००१२५, ९५५२६२९२४५

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “मकरसंक्रांतीची खगोलीय गुणवैशिष्ट्ये…” ☆ श्री जगदीश काबरे ☆

श्री जगदीश काबरे

☆ “मकरसंक्रांतीची खगोलीय गुणवैशिष्ट्ये…☆ श्री जगदीश काबरे ☆

मकरसंक्रांत हा भारतीय उपखंडातील सर्वांत महत्त्वाचा खगोलशास्त्रीय आणि सांस्कृतिक सण मानला जातो. तो धार्मिक सण म्हणून जरी ओळखला जात असला तरी त्याच्या मुळाशी पृथ्वी-सूर्य यांच्या गतीशी निगडित असलेली एक अत्यंत निश्चित आणि मोजता येण्यासारखी खगोलीय घटना दडलेली आहे. मकरसंक्रांतीचा गाभा “मकरसंक्रामण” या संकल्पनेत आहे. मकरसंक्रामण म्हणजे सूर्याचा एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश. भारतीय सौर पंचांगानुसार सूर्य जेव्हा धनू राशीतून मकर राशीत प्रवेश करतो, त्या क्षणास मकरसंक्रामण घडते आणि त्यादिवशी  मकरसंक्रांत साजरी केली जाते. ही घटना पूर्णपणे सूर्याच्या भासमान गतीवर आधारित असल्याने ती चंद्राच्या कलांवर अवलंबून नसते, म्हणूनच बहुतेक हिंदू सणांप्रमाणे मकरसंक्रांतीची तारीख फारशी बदलत नाही आणि ती साधारणपणे १४ किंवा १५ जानेवारीस येते.

मकरसंक्रामण समजून घेण्यासाठी सर्वप्रथम पृथ्वी-सूर्य यांच्यातील भौगोलिक आणि खगोलीय नाते समजून घेणे आवश्यक ठरते. पृथ्वी सूर्याभोवती लंबवर्तुळाकार कक्षेत परिभ्रमण करते. या परिभ्रमणास सुमारे ३६५.२४२२ दिवस लागतात. पृथ्वीचा अक्ष तिच्या कक्षेच्या पातळीशी साधारणपणे २३.५ अंशांनी कललेला आहे. या अक्षीय कलनामुळे पृथ्वीवर ऋतू निर्माण होतात. जर पृथ्वीचा अक्ष सरळ असता तर पृथ्वीवरील सर्व भागांवर वर्षभर सूर्यकिरण समान कोनात पडले असते आणि ऋतूंचा प्रश्नच निर्माण झाला नसता. पण पृथ्वीच्या अक्षीय कलनामुळे काही काळ उत्तर गोलार्ध सूर्याकडे झुकलेला असतो तर काही काळ दक्षिण गोलार्ध सूर्याकडे झुकलेला असतो. याच भौगोलिक रचनेतून उत्तरायण आणि दक्षिणायन या संकल्पना निर्माण झालेल्या आहेत.

सूर्य प्रत्यक्षात स्थिर असून पृथ्वी त्याच्याभोवती फिरते, परंतु पृथ्वीवरून पाहताना सूर्य आपल्याला आकाशात एका ठराविक मार्गाने फिरताना दिसतो. या मार्गाला क्रांतीवृत्त म्हणतात. क्रांतीवृत्ताच्या मार्गावर सूर्य ज्या १२ प्रमुख तारकासमूहांतून जातो, त्यांना राशी म्हणतात. या राशी खगोलशास्त्रीय दृष्टीने स्थिर तारकासमूहांशी निगडित आहेत. भारतीय ज्योतिषशास्त्रात वापरली जाणारी राशीपद्धती ही सायन नसून निरायन म्हणजेच तारकासापेक्ष आहे. त्यामुळे भारतीय पंचांगातील सूर्याचे राशीस्थान प्रत्यक्ष तारकासमूहांशी साधर्म्य राखते. सूर्य जेव्हा मकर राशीतील तारकासमूहाच्या समोर येतो, त्या क्षणास मकरसंक्रामण घडते असे मानले जाते.

भौगोलिक दृष्टिकोनातून मकरसंक्रामणाचे महत्त्व अधिक व्यापक आहे. सूर्याचा भासमान दक्षिणेकडील प्रवास थांबून उत्तरेकडे सुरू होतो, हा कालखंड म्हणजे उत्तरायणाची सुरुवात. साधारण २१ किंवा २२ डिसेंबरला हिवाळी अयनांत होतो, त्या दिवशी सूर्य दक्षिण गोलार्धात सर्वाधिक दक्षिणेला असतो. त्या नंतर सूर्याची भासमान स्थिती उत्तरेकडे सरकू लागते. भारतीय परंपरेत मात्र उत्तरायणाची गणना मकरसंक्रामणापासून केली जाते. याचे कारण म्हणजे पारंपरिक भारतीय पंचांगातील निरायन गणितीय पद्धत आणि अयनचलन यातील फरक. अयनचलन म्हणजे पृथ्वीच्या अक्षाचे अत्यंत संथ गतीने होणारे दोलन. या दोलनामुळे सुमारे दर ७२ वर्षांनी विषुवबिंदू एक अंश मागे सरकतो. त्यामुळे सुमारे २००० वर्षांत ऋतू आणि राशी यांच्यात लक्षणीय फरक निर्माण झालेला आहे.

मकरसंक्रामणाच्या वेळी सूर्य मकरवृत्ताच्या जवळ असतो. मकरवृत्त म्हणजे पृथ्वीवरील २३.५ अंश दक्षिण अक्षांशावरील काल्पनिक रेषा. सूर्य जेव्हा या रेषेवर लंबवत किरण टाकतो, त्या क्षणास दक्षिण गोलार्धात उन्हाळा आणि उत्तर गोलार्धात हिवाळा असतो. मकरसंक्रांतीच्या सुमारास सूर्य हळूहळू उत्तरेकडे सरकत असल्याने उत्तर गोलार्धात दिवसांची लांबी वाढू लागते. या बदलाचा प्रत्यक्ष अनुभव शेतकरी समाजाने हजारो वर्षांपूर्वी घेतलेला होता. दिवस मोठे होऊ लागणे, सूर्यकिरणांची तीव्रता वाढणे आणि तापमानात हळूहळू वाढ होणे या सर्व गोष्टी कृषी प्रक्रियेसाठी अनुकूल ठरतात. त्यामुळे मकरसंक्रांत हा सण केवळ धार्मिक नसून कृषी जीवनाशी घट्ट जोडलेला आहे.

खरे पहाता, दरवर्षी सूर्य कर्कवृत्तावर (म्हणजे उत्तर अयनबिंदूवर) येण्याची तारीख थोडीफार बदलत राहते, पण हा बदल मोठा नसून साधारणपणे एक दिवसाच्या आत मर्यादित असतो. खगोलशास्त्रीय दृष्टिकोनातून पाहिले तर सूर्य कर्कवृत्तावर असणे ही घटना म्हणजे पृथ्वीच्या उत्तर गोलार्धात ग्रीष्म अयनांत प्रामुख्याने २० जून, २१ जून किंवा क्वचित २२ जून या तारखांना घडते. या तारखेतील बदलाचे मुख्य कारण म्हणजे पृथ्वीला सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी लागणारा कालावधी हा नेमका ३६५ दिवसांचा नसून सुमारे ३६५.२४२२ दिवसांचा असतो. आपले दिनदर्शिकेतील सामान्य वर्ष मात्र ३६५ दिवसांचे असल्याने दरवर्षी सुमारे पाव दिवसाचा फरक साचत जातो. हा फरक भरून काढण्यासाठी प्रत्येक चार वर्षांनी एक अधिवर्ष (लीप इयर) घालण्यात येते. तरीसुद्धा हे समायोजन पूर्णपणे अचूक नसल्यामुळे अयनांत आणि विषुव यांच्या तारखा थोड्याफार पुढे-मागे सरकत राहतात. याशिवाय पृथ्वीच्या अक्षाच्या कलामध्ये (सुमारे २३.५ अंश) अतिशय सूक्ष्म पण दीर्घकालीन बदल आणि पृथ्वीची कक्षा पूर्णपणे वर्तुळाकार नसणे, तसेच ग्रहांच्या गुरुत्वाकर्षणामुळे होणारे सूक्ष्म व्यत्यय यांचाही परिणाम या तारखेवर होतो. त्यामुळे सूर्य “कर्कवृत्तावर” येण्याचा नेमका क्षण (तास-मिनिटांपर्यंत) दरवर्षी बदलतो आणि त्यानुसार दिनदर्शिकेतील तारीखही बदलताना दिसते.

 

भारतीय पारंपरिक पंचांगात मात्र सूर्याचा कर्कसंक्रांतीत प्रवेश साधारणतः १६ किंवा १७ जुलै असा दाखवला जातो. याचे कारण म्हणजे पंचांगात वापरली जाणारी निरयन (स्थिर ताऱ्यांशी निगडित) गणना आणि आधुनिक खगोलशास्त्रातील सायनात्मक (ट्रॉपिकल) गणना यांमधील अयनचलनाचा फरक. त्यामुळे “सूर्य कर्कवृत्तावर” ही संकल्पना खगोलशास्त्रीयदृष्ट्या जूनमध्ये येते, तर धार्मिक-पंचांग परंपरेत ती जुलैमध्ये दिसते.

या विवेचनावरून आपल्या लक्षात येईल की, मकरसंक्रांत ही एक अत्यंत नियमित आणि गणितीय अचूकतेने ठरवता येणारी घटना आहे. आधुनिक खगोलशास्त्र सूर्याचे स्थान सेकंदाच्या अंशापर्यंत मोजू शकते. आज पंचांगकार संगणकीय गणिताच्या साहाय्याने मकरसंक्रामणाचा अचूक क्षण निश्चित करतात. पूर्वी मात्र निरीक्षणावर आधारित साधने वापरली जात होती. सावलीची लांबी, सूर्याच्या उंचीतील बदल, दिवसाच्या कालावधीतील वाढ या घटकांच्या आधारे ऋतूंचे आणि संक्रांतींचे ज्ञान मिळवले जात असे. हे ज्ञान केवळ धार्मिक विधींसाठी नव्हे तर शेती, पाणी व्यवस्थापन आणि समाजजीवनाच्या नियोजनासाठी अत्यंत उपयुक्त ठरले होते. मकरसंक्रांतीच्या वेळी सूर्याचे पृथ्वीवरील विविध अक्षांशांवरील परिणाम वेगवेगळे दिसून येतात. विषुववृत्ताजवळ सूर्यकिरण वर्षभर जवळजवळ लंबवत पडतात, त्यामुळे तेथे ऋतूंचा फारसा फरक जाणवत नाही. पण उत्तर गोलार्धातील मध्यम अक्षांशांवर, जसे की भारत, येथे मकरसंक्रांतीनंतर सूर्यकिरण अधिक थेट पडू लागतात. त्यामुळे थंडीची तीव्रता हळूहळू कमी होत जाते. हिमालयीन प्रदेशात बर्फ वितळण्याची प्रक्रिया सुरू होते, नद्यांमध्ये पाण्याचे प्रमाण वाढण्यास मदत होते आणि शेतीसाठी आवश्यक ओलावा उपलब्ध होतो. या सर्व भौगोलिक बदलांचा मानवाच्या जीवनावर खोलवर परिणाम झालेला आहे.

एकूणच पाहता मकरसंक्रांत हा सण म्हणजे केवळ धार्मिक श्रद्धेचा विषय नसून तो पृथ्वीच्या गतीशी, सूर्याच्या भासमान हालचालींशी, अक्षीय कलनाशी, अयनचलनाशी आणि ऋतू परिवर्तनाशी थेट संबंधित आहे. मकरसंक्रामण ही एक खगोलीय घटना असून तिचे परिणाम भौगोलिक, पर्यावरणीय, कृषी आणि मानवी जीवनाच्या विविध पैलूंवर पडलेले आहेत. आधुनिक विज्ञानाने या घटनेचे गणितीय स्पष्टीकरण दिले असले तरी प्राचीन भारतीयांनी निरीक्षण, अनुभव आणि परंपरेच्या माध्यमातून या बदलांचे भान ठेवले होते हे नाकारता येत नाही. त्यामुळे मकरसंक्रांतीकडे अंधश्रद्धेच्या चौकटीतून नव्हे तर निसर्गातील नियमित, समजून घेण्यासारख्या आणि मानवजीवनाशी जोडलेल्या एका वैज्ञानिक घटनेच्या रूपात पाहणे अधिक योग्य ठरते.

© श्री जगदीश काबरे

(लेखक विज्ञान आणि वैज्ञानिक दृष्टिकोन प्रसारक आहेत.)

jetjagdish@gmail. com

मो ९९२०१९७६८०

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “शिक्षण क्षेत्रातील काही भयावह…” ☆ सुश्री शीला पतकी ☆

सुश्री शीला पतकी 

🌸 विविधा 🌸

☆ “शिक्षण क्षेत्रातील काही भयावह…” ☆ सुश्री शीला पतकी 

चार दिवसांपूर्वीचे वर्तमानपत्रात एक बातमी वाचली… क्लासेस मध्ये घडलेली घटना… शिक्षक फळ्यावर लिहित आहेत म्हणजे ते पाठमोरे आहेत… इतक्यात एका विद्यार्थ्याने दुसऱ्या विद्यार्थ्यांचा गळा चिरून टाकला… वर्गात गोंधळ त्या मुलाला दवाखान्यात… तोपर्यंत त्याचा प्राण गेलेला…! इतकी कृरता इतक्या कमी वयाच्या मुलांमध्ये येथे कुठून?

मी या बातमीने खूपच अस्वस्थ झाले. किती भयानक घडायला लागलेल आहे आणि हे एक दिवशी घडणार याची मला खात्रीच होती. कारण मी जी नापास शाळा चालवत होते त्यामध्ये येणारी सगळी मुलं ही आगाऊ खोडकर त्रास देणारी कोणती शिस्त नसणारी बेफिकीर असत. त्यांना शिकण्याची इच्छाच नसते. आई-वडिलांनी शाळेत डांबलेली मुले. कित्येक शाळेतून शिक्षकांचे मला फोन नाही आलेत की या मुलाला घेऊ नका फार त्रासदायक मुलगा आहे पण मी चॅलेंज म्हणून अशी मुलं स्वीकारायची आणि त्यांच्या चांगले बदल घडवून आणत होते. काही मुले मुळतः चांगल्या घरातून आलेली होती संस्कारी होती पण ही जी बेफिकीर मुले होती त्यांच्या खोड्यांना सुद्धा मर्यादा होत्या. काहीतरी चांगलं दिलं तर ऐकण्याची वृत्ती होती. आजकाल तसे राहिले नाही साधारणपणे 19-20 सालची घटना असावी.. इंग्रजीचे शिक्षक फळ्यावर एक मोठं वाक्य लिहीत होते. म्हणजे साधारण एक 30-40 सेकंद ते वर्गाला पाठमोरे… इतक्यात एका मुलाने समोरच्या मुलाचे डोळे बंद केले… दुसऱ्याने तोंड दाबले आणि दोघांनी त्याला बेदम मारले. हे अवघ्या काही सेकंदात घडले. शाळा सुरू झाल्यानंतर ची घटना… मुख्याध्यापकांचा मला फोन आला तातडीने मी घरातून शाळेत गेले. ज्याला मारलं होतं तो मुलगा खूप रडत होता त्याला मी जवळ घेतलं कुठे खूप लागलय का याची दखल घेतली पण सुदैवानं तोही दणकट असल्याने फारसा परिणाम झाला नव्हता. पण मी मात्र हाबकून गेले. मन विचार करायला लागले ह्या मुलाला जर काही झालं असतं तर…! हा सगळा जिवानिशीचा खेळ आहे… दिवसेंदिवस मुलं वाईट व्हायला लागलेत. एके दिवशी एका मुलाने दोन कबूतरच विकत आणली आणि ती शाळेत ठेवली शाळेच्या आवारा बाहेर पार्किंग मध्येएका खोक्यात.. त्यातून आवाज आल्यामुळे सगळ्याकडे हलकल्लोळ की आत नेमकं काय.. मग ती ज्याचे कबूतर होते त्याने मान्य केले की आपणच तो बॉक्स तिथे ठेवलाय आणि कबूतर हे प्रकरण काय आहे… तर काही ग्रामीण भागातील मुले अशी कबुतरे पकडून आणून विद्यार्थ्यांना विकतात त्याचे पैसे पूर्ण झाले नाही की मग बाहेर मारामाऱ्या होतात हे सगळे मोठे रॅकेटच होते त्यापैकी एका विद्यार्थ्याला ठार मारल्याचे ही मी वर्तमानपत्रात वाचले होते. अर्थात ही अन्य ठिकाणी घडलेली घटना होती… त्यानंतर वर्गात बसल्या बसल्या पटकन शेजारच्या मुलीचा हात पकडायचा नको त्या गोष्टी करायच्या आणि मित्राने त्याचा फोटो काढायचा हे तर अजूनच भयानक होतं… माझ्या कल्पनाशक्ती पलीकडचे सगळे खेळ चालले होते… त्या दिवशी ठरवलं ही शाळा आणि हा उपक्रम बंद करायचा कोणाचातरी भलं करायला जाण्यासाठी इतकी मोठी रिस्क आपण आपल्या आयुष्यात पत्करायची नाही. त्यानंतर कोविड मुळे हे काम आपोआपच बंद पडले मुलं नापास होण्यास बंद झाले आता ह्या अधोगतीला सुरुवात कुठून झाली पहा!

अनेक वर्षांपूर्वी पहिली ते चौथीपर्यंत कोणालाही नापास करायचे नाही असा शासनाचा नियम निघाला. शाळातून फतवा गेला आणि मग सुरू झाली अभ्यासाच्या अधोगतीला…! नापास होणार नाही म्हणल्यावर पालकांचे लक्ष कमी शिक्षकही तितक्या चांगल्या पद्धतीने काम करेनात कारण सगळे शेवटी रिझल्ट ओरिएंटेड असतं ना तो काय लागणार आहे नक्कीच माहीत होते त्यामुळे मेहनत करण्याची काही गरज भासली नाही. पालक निवांत… शिक्षक निवांत.. त्यामुळे विद्यार्थी बेदरकार बनत चालले. त्यापेक्षा चांगला शब्द होईल बेलगाम बनत चालले. चौथीतून आलेला गाळ वरती शिकवताना म्हणजे पाचवीच्या शिक्षकाला फारच त्रासदायक होऊ लागला. कारण त्याला लिहिता वाचताच येत नव्हते… लिहिता वाचता न येण्याची सुरुवात येथे झाली मग आम्ही वरती म्हणजे हायस्कूलला असे विद्यार्थी वेगळे करून तुकडी वेगळी केली आणि त्याच्यावरती वर्षभर विशेष प्रयत्नाने लिहा वाचायला शिकवायचे असे ठरले… पण तरी पाचवीचा अभ्यासक्रम पूर्ण करणे गरजेचे होते ना त्यामुळे तिथे यथातथाच काम झाले. राजकीय लोकांना शिक्षणाने शहाणे झालेले लोक नकोच होते. त्यामुळे आठवीपर्यंत कोणालाही नापास करायचे नाही हा नियम निघाला. चौथीपर्यंतचे वाटोळे झाले होते आता आठवीपर्यंत झाले!

अभ्यासाची भीती नाही अभ्यासक्रम शिकवण्याचे वेगळेपण नाही सगळे निवांत झाले सरकारी काही कामात आठवीपर्यंतचे शिक्षण कंपल्सरी झाले माझ्या नापास शाळेमध्ये ऍडमिशन घ्यायला येणार्‍यांची संख्या वाढली शाळेत येऊ शकत नाही पण परीक्षाला 17 नंबर फॉर्म भरून बसतो असे सांगणारे खूप लोक येऊ लागले कारण गाडीचे लायसन रिक्षाचं लायसन अन्य काही ठिकाणी किमान आठवी पास पाहिजे हा नियम निघाला आता तुम्ही शाळेत आला नाही तर पास कसे होणार? त्यावर त्यांचे उत्तर काय तर… दहावी नापास झाल्याचे सर्टिफिकेट आहे म्हणजे आठवी पास आहेच की त्यामुळे आम्हाला लायसन मिळण्यास कोणती अडचण येत नाही. मी डोक्याला हात च लावून घेतला…! काही कर्ज मिळण्यासाठी सुद्धा याचा उपयोग होऊ लागला… हे सर्व गणित ग्रामीण भागातल्या शाळांवर असतं कारण ही सगळी तयारी ग्रामपंचायत पासून असते… मला आठवते मध्यंतरी आमदारकीला उभं राहण्यासाठी दहावी पास ची आवश्यकता होती आणि सोलापुरातील एक आमदार एका ग्रामीण सेंटरला जाऊन बसून पास झाले होते. शिक्षणाक्षेत्रातल्या या घडामोडी आणि बदल या घटना राजकीय क्षेत्राशी निगडित असतात. त्यामुळे आठवीपर्यंतची मजल पुढे सरकत सरकत… नववीला नापास होणाऱ्यांची पुनर्परीक्षा घ्यावी असे ठरले. म्हणजे त्यांना लगेच दुसऱ्यांदा संधी द्यायची महिनाभर त्यांचे वर्ग घ्यायचे. आता मला सांगा उन्हाळ्याची सुट्टी सोडून यांचे वर्ग कोण शिक्षक घेत बसतो? त्यामुळे नववीत हजर असणारे सर्व उत्तीर्ण घोषित होऊ लागले…! आता यांना रोखणारा एकच वर्ग उरला तो म्हणजे इयत्ता दहावी ची बोर्ड परीक्षा ती तरी त्याचं खरं परीक्षण करेल असं वाटलं होतं… पण बोर्डाने शंभर मार्काच्या पेपरच्या ऐवजी 80 चा पेपर आणि 20 मार्क तोंडी परीक्षा किंवा इतर काम याला द्यायला सुरुवात केली… शाळा कशाला त्याला कमी देतायेत वीस पैकी 20! मग पास होण्यासाठी उरले फक्त पंधरा मार्क ते तर पहिल्या गाळलेल्या जागा जोड्या लावा यात सहज मिळून जायचे आणि बोर्डाचा रिझल्ट लागला 98% दोन टक्के…! अनुपस्थित विद्यार्थी नापास म्हणजे तळापासून वर पर्यंत विद्यार्थ्यांचा पायाच उखडून टाकण्यात आला. त्यामुळे वाचायला न येणारे विद्यार्थी लिहायला न येणारे विद्यार्थी तुम्हाला आढळतील आणि मग सामान्य माणसं म्हणत राहतात दहावी झालाय पण वाचता सुद्धा येत नाही हे कसले शिक्षण…? काहीच शिकवत नाहीत शिक्षक…! सरकारी नियमच असे आहेत… फक्त दहा वर्षाची हजेरी लावा आणि सर्टिफिकेट घेऊन जा… पालकांनाही वाटत नाहीये की आपल्या मुलाला काही आले पाहिजे. आता जे पालक सुज्ञ आहेत त्याला मुलाचे खऱ्या अर्थाने भवितव्य घडवायचे आहे ते मात्र जाणीवपूर्वक त्या मुलावर काम करतात आणि ती मुलं हुशार निघतात शिक्षणात पुढे जातात.

माझ्या शाळेतल्या मुलांचे रेकॉर्ड आहे बरेचसेच विद्यार्थी हे कॉन्टॅक्टर् झालेले आहेत ठेकेदार झालेले आहेत मुकादम झालेले आहेत सरकारी क्षेत्रातली टेंडर यांच्या नावे फुटतात यातील काही राजकीय नेतेही झाले आहेत व्यावसायिक झाले आहेत अर्थात काही उत्तम नोकरदार व्यावसायिक सुद्धा झालेले आहेत पुढील शिक्षण नाही म्हणून त्यांचे काही अडले नाही… शिक्षणाने माणूस घडतो का? हा प्रश्न मला पुन्हा नव्याने पडू लागला… अर्थात त्याचे उत्तर माझ्यासारख्या विवेकी माणसाला मिळाले…! कारण तुम्ही कितीही मोठे झालात तरी शिक्षणाबरोबर मिळणारे ज्ञान आणि संस्कार यांनी तुम्ही खरे माणूस होता अर्थात ते योग्य दिले गेले असतील तर…! यासाठी शिक्षणाचा जो त्रिकोण सांगितला आहे पालक शिक्षक आणि विद्यार्थी त्या त्रिकोणामध्ये काम होण्याची गरज आहे. विद्यार्थ्याला शिक्षणाची लालसा पाहिजे… पालकांना वेळ काढून लक्ष देण्याची गरज आहे… आणि शिक्षकाला शिकवण्याविषयी आस्था हवी… हे तिन्ही घटकात कमी असल्यामुळे शैक्षणिक मूल्यांचा ऱ्हास होत चालला आहे. गुंड प्रवृत्तीची… खलनायकी वृत्तीची.. मुले तयार होत आहेत. आणि त्यामुळे समाजामध्ये गुंडगिरी बलात्कार खून मारामाऱ्या ह्या गोष्टी वाढल्या आहेत. यामध्ये समाजाचेही काम आहे सरकारचे हे काम आहे की आपण येणाऱ्या पिढीसमोर काय आदर्श ठेवतोय सरकार गुंडांना पाठीशी घालत असेल सत्तेत येण्यासाठी ठाऊक असलेल्या गुंडानाही प्रवेश देत असेल.. मूल्यावरची गणिते सोडुन आकड्यावरची गणिते मांडत असेल… तुरुंगातून सुटून आलेल्या गुंडांच्या मिरवणुका निघत असतील.. हार तुरे यांनी त्यांचे स्वागत होत असेल आणि आम्ही निवडून दिलेल्या प्रतिनिधींच्या शेजारी ते सन्मानाने बसताना दिसत असतील तर समाजातील आज निरागस असलेल्या मुलाने घ्यावे तरी काय सगळेच विचाराच्या पलीकडे चालले आहे!!! अर्थात सगळे संपले आहे असे कधी होत नाही भारतीय संस्कृतीत तरी नाहीच नाही… अजूनही काही दिलासादायक उदाहरणे आहेत तीच या देशाला तारतील आणि आमच्या अस्वस्थ मनाला दिलासा देतील अशी सद्भावना व्यक्त करण्यापलीकडे आपण तरी आता काय करू शकतो…? यासाठी समाजातील अनेक घटक ही जबाबदार आहेत सामाजिक परिस्थिती चित्रपट मोबाईल सोशल मीडिया पण या इतक्या सगळ्या घटकांवर एका लेखात लिहिणे शक्य नाही त्यामुळे फक्त पायाभूत गोष्टी मांडल्या आहेत.

© सुश्री शीला पतकी

निवृत्त मुख्याध्यापिका सेवा सदन प्रशाला आणि संचालिका नापास शाळा सोलापूर

मो 8805850279

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ मला समजलेली संत तुकारामांची गाथा… भाग – ४… ☆ सुश्री अरुणा मुल्हेरकर ☆

सुश्री अरुणा मुल्हेरकर

? विविधा ?

☆ मला समजलेली संत तुकारामांची गाथा… भाग – ४ ☆ सुश्री अरुणा मुल्हेरकर ☆

भक्तीतून तुकारामांना प्राप्त झालेली अधिकार वाणी-

गाथेतील एकेक अभंग वाचत गेले की संत तुकाराम महाराजांना विठ्ठलाच्या भेटीची अत्यंत तळमळ लागून राहिली आहे, हे आपण पहिल्या तीन भागात पाहिले. अशी अनन्य भक्ती करत असताना पांडुरंगाशी ते कित्येक वेळा मोठ्या अधिकार वाणीने बोलत आहेत याची जाणीव होते.  

पांडुरंगाने त्यांना भेट द्यावी म्हणून या अभंगातील महाराजांचा युक्तिवाद पहा.

ठाईची ओळख ही येईल टाकू टाका सुखी

तुमचे जाईल इमान माझे कपाळी पतन

ठेवीला तो ठेवा अभिलाषा बुडवावा

मनी न विचारा तुका म्हणे हे दातारा 

स्वतःचा उद्धार करण्यासाठी तुकाराम महाराज विनवणी करत आहेत. ते म्हणतात, ” देवा, तुझी आणि माझी फार जुनी ओळख आहे, ती तू विसरू शकत नाहीस. जर विसरलास तर तूच बदनाम होशील. तुझे इमान जाईल आणि माझे पतन होईल. ” यासाठी ते दृष्टांत देतात. म्हणतात, ” एखाद्या जवळ कोणी काही ठेवा ठेवण्यासाठी म्हणून दिला आणि त्याच्याकडून तो काही कारणास्तव बुडाला, तर तो लोभाने बुडाला असेच म्हटले जाईल. म्हणून हे दातारा

 या गोष्टीचा तू विचार कर (आणि मला दूर लोटू नकोस.)

कारे माझा तुज ये कळवळा

असोनी जवळा हृदयस्था

अगा नारायणा निष्ठा निर्गुणा

केला शोक नेणा कंठस्फोट

काय चित्त नाही पावत विश्रांती

इंद्रियाची गती खुंटेचीना

तुका म्हणे का हो धरीयेला कोप

सरले नेणो पाप पांडुरंगा

पांडुरंगा तू माझ्या हृदयात आहेस. इतका जवळ आहेस तरी तुला माझी करुणा का येत नाही?

हे नारायणा, तू देव असून गुणातीत आहेस, मग इतका निष्ठूर का आहेस? घसा फुटेपर्यंत मी रडलो तरी तू माझ्याकडे जराही लक्ष देत नाहीस. माझी विषयासक्ती दिवसेंदिवस वाढतच आहे, ती का थांबत नाही? माझे चित्त अजून शांत का होत नाही? देवा तू माझ्यावर रागावला आहेस का?

मधूनच ते विठ्ठलाशी अशा प्रकारे सलगीने बोलतात.

दीनानाथ तुझी ब्रिदे चराचर

घेशील कैवार शरणागता

तू दीनांचा स्वामी आहेस आणि तुला शरण आलेल्या तुझ्या भक्तांचा तू कैवारी आहेस.

पुराणी जे तुझे गरजेची पवाडे

ते आम्हा रोकडे कळो आले

आपल्या दासाचे न साहसी उणे

उभा त्या कारणे राहिलासी

तुका म्हणे तुज भक्तीचे कारण

करावया पूर्ण अवतार*

वेद पुराणात तुझी कीर्ती वर्णिली आहे. तुझ्या दासांवरची संकटे तुला सहन होत नाहीत. तू ती तात्काळ दूर करतोस. त्याच्यासाठी तू सदैव उभा आहेस. भक्ताचे कार्य पूर्ण करण्यासाठीच तुझे अवतार आहेत.

शिवाजी महाराजांवर परचक्रं आली, तेव्हा महाराज विठ्ठलाला अधिकाराने सांगतात.

न देखवे डोळा ऐसा हा आकांत

परपीडे चित्त दुःखी होते

काय तुम्ही येथे नसालसे झाले

आम्ही न देखीले पाहिजे हे

परचक्र कोठे हरिदासांच्या वासे

न देखजे ते देशे राहातिया

तुका म्हणे माझी लाजवीली सेवा

हीन पणे देवा जिणे झाले

देवाला निर्वाणीच्या शब्दात गाऱ्हणे घालतात. विठ्ठला, हा दुःखद प्रसंग मला पाहवत नाही. हे असे का व्हावे? त्यावेळी तू तेथे नव्हतास का?

अशा प्रकारचे दुःख आम्हाला दिसता कामा नये. हरिदासाच्या घरी परचक्र येतेच कसे? मी तुमची इतकी सेवा केली, तिला तुम्ही लाज आणली आणि मलाही न पणे जगणे प्राप्त झाले. — किती ही अधिकार वाणी!

 पुढच्या अभंगात महाराज विठ्ठलाला सांगतात, हरी किर्तन आणि सर्व भक्त तरले जावेत, हे त्याचे खरे फळ आहे. हे जे परचक्र आले आहे, त्यावरून आपणच सगळा उच्छाद मांडला असावा असे वाटते. पूर्व जन्मातील पाप असल्याशिवाय असे पाप पुढे येत नाही हे या प्रसंगाने उघड आहे, पण जेथे तुमचे दास राहतात तेथे तुम्ही पण राहता हे मी खरे कसे मानावे? असा परखड प्रश्न महाराज देवाला विचारतात.

पुढील भागात अधिकारवाणीच्या आणखी काही अभंगांचा विचार मांडण्याचा प्रयत्न असेल.

क्रमशः… १ 

© सुश्री अरुणा मुल्हेरकर 

डेट्राॅईट (मिशिगन) यू.एस्.ए.

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ तो आणि मी…! – भाग ८८ ☆ श्री अरविंद लिमये ☆

श्री अरविंद लिमये

? विविधा ?

☆ तो आणि मी…! – भाग ८८ ☆ श्री अरविंद लिमये ☆

(पूर्वसूत्र- हाकेच्या अंतरावर आलेल्या प्रकाशन समारंभाचा आनंद हिरावून घेणारी ही परिस्थिती निर्माण व्हायला निमित्त ठरलेली आमच्या जी. एम्. मॅडमची व्हिजीट मला त्या अस्वस्थतेत एखाद्या भयंकर संकटासारखीच वाटत राहिली! .. पण प्रत्यक्षात मात्र ती माझ्यासाठी ‘त्या’नेच घडवून आणलेली इष्टापत्तीच ठरणार होती हे मला कुठे माहित होतं? )

याच आमच्या जी. एम्. मॅडम या आधी कांही वर्षांपूर्वी इथे या झोनल ऑफिसलाच डी. जी. एम्. म्हणून कार्यरत होत्या आणि इथूनच जी. एम्. म्हणून प्रमोट झाल्यावर त्यांचं पोस्टींग ‌सेंट्रल ऑफिसला झालेलं होतं. अर्थात या गोष्टीला चारएक वर्षं उलटून गेलेली असली तरी मी तेव्हा कोल्हापूर रिजनमधे असल्याने अनेकदा त्यांची रिजनल ऑफिसला व्हिजीट व्हायची. तेव्हा होणाऱ्या ब्रॅंच मॅनेजर्स मिटिंग्जमुळे आणि एरवीही ब्रॅचेस् मधील महत्त्वपूर्ण मॅटर्ससंबंधात ब्रॅंचमॅनेजर्सशी त्यांचा अधूनमधून थेट संपर्कही असल्याने आमच्यापैकी अनेकांना त्या व्यक्तिगत पातळीवर ओळखायच्याही. त्यामुळेच त्यांचा अॅप्रोच, स्वभाव आणि त्यांची कामाची पध्दत आम्हाला नवीन नव्हती. त्या एवढ्या स्ट्रीक्ट होत्या की आमच्या ब्रँच व्हिजीटला त्या येणार असतील तेव्हा तर त्या येणार या कल्पनेचंच प्रचंड दडपण यायचं. पारशी माणसांचं वरवर फटकळ वाटणारं थेट बोलणं तरीही मनातल्या एका कोपऱ्यात ते जपत असलेलं मेणाचं मऊपण सुरुवातीची कांही वर्षे मी मुंबईत काम केल्याने जवळून अनुभवलेलं होतं. मॅडमसुध्दा छोट्या छोट्या कारणानेही खूप चिडायच्या, संतापाच्या भरात कांहीही बोलायच्या, त्यांचं तरबत्तर होत केलेलं फायरींग ऐकणाऱ्यासाठी चाबकाच्या फटक्यासारखंच असायचं. तरी त्याचा शब्दशः अर्थ घ्यायचा नसतो आणि राग उतरला कीं त्या लगेचच शांतही होतात हेही मला अनुभवाने माहित झालेलं होतं! त्यामुळे आणि यावेळी आमच्यामधे वखरेसाहेबांसारखा शाॅक अॅब्साॅर्बर असल्यानेही त्यांच्या यावेळच्या या आकस्मिक व्हिजीटचं मला फारसं दडपण वाटत नव्हतं. तरीही सगळं सुरळीत पार पडावं यासाठी मी प्रयत्नशील होतोच.

त्या आल्या आणि पाचेक मिनिटातच येथील आमच्यासारख्या फर्स्ट लाईन विभागप्रमुखांना वखरे साहेबांनी इंटरकॉम करून केबिनमधे बोलावून घेतलं. आम्ही सर्वजण आत पोचेपर्यंत आमचे डी. जी. एम्. श्री. वखरेसाहेब यांच्याबरोबर मॅडमची प्राथमिक चर्चा सुरूही झालेली होती. मॅडमनी आमच्याकडे ओझरता कटाक्ष टाकून आम्हाला बसायची खूण केली. पाठोपाठ सर्वांसाठी चहाही आला. चर्चेला अर्धविराम देत चहा घेता घेता त्यांनी आम्हा सर्वांची औपचारिक चौकशी करून आम्हाला निरोप दिला आणि मग त्यांच्या मीटिंगचं असणारं थोडंफार दडपडही त्याच क्षणी विरून गेलं. पण आम्ही सर्वजण केबिनचं दार ढकलून बाहेर पडणार एवढ्यांत त्यांच्या नेहमीच्या परिचित अशा दरडावणीच्या स्वरांत त्यांनी आम्हाला थांबायला सांगितलं आणि हाताने आत यायची खूण केली. केबिनमधलं तोवर नाॅर्मल वाटणारं वातावरण अचानक बदललं. वखरेसाहेब कांहीसे गंभीर होत काय झालं असावं याचा अंदाज घेत मॅडमकडे पहात राहिले.

” मैं सिटी और कॅंप ब्रॅंचको व्हिजीट करने जा रही हूॅं| थोडी देरमे वापस आऊंगी| तब बाद मे एकेक को देख लू़ंगी|.. ” काय होतंय आम्हाला समजेचना. कसं रिअॅक्ट व्हावं, काय बोलावं ते न समजून आम्ही एकमेकांकडे पहात राहिलो. आणि दुसऱ्याच क्षणी.. “तब तक एंजाॅय करोs.. ” म्हणत गंमत केल्यासारखं स्वत:वरच खूष होत त्या खळखळून हसत राहिल्या. आणि एकदम तो स्वीच आॅफ करून.. “देखो… मैं क्या कह रही थी.. ” म्हणत त्यांनी आपला मोर्चा वखरेसाहेबांकडे वळवला. आम्ही वळून जायला लागलो तेव्हा अतिशय सौम्य शब्दांत “बाद मे इन सबको दोपहरकी मिटिंग के बारेमे बता देना.. ” म्हणाल्या.

ते ऐकलं आणि त्या दुपारच्या मीटिंगचं दडपण सोबत घेऊनच आम्ही बाहेर पडलो. आपापल्या केबिनमधे आलो. मॅडमचा हा समोरच्याला कसलाच अंदाज बांधता न येणारा स्वभाव माझ्या परिचयाचा असला तरी मलाही थोडं दडपण जाणवू लागलं होतं ते कसलाच अजेंडा समोर नसताना मीटिंगमधे अचानक काय विचारलं जाईल याचंच. तेवढ्यांत इंटरकॉमची रिंग वाजली. फोनवर टेलिफोन ऑपरेटर बोलत होती.

” तुम्हा सर्वांसाठी साहेबांचा निरोप आहे. ते मॅडम बरोबर ब्रॅंच व्हिजिटसाठी बाहेर पडलेयत. तासाभरात दोघे परत येतील. त्यानंतर लगेचच सर्व डिपार्टमेंटल हेडस् सोबत मॅडमची लंच मीटिंग होईल आणि त्यांच्या टूर प्रोग्रॅम प्रमाणे त्या कोल्हापूर व्हिजीटसाठी निघतील. “

निरोप स्पष्ट होता. पण हातात मिटिंगची पूर्वतयारी करण्याइतका वेळही नव्हता. मीटिंगमधे जे प्रश्न विचारले जातील त्यांना स्वत:च्या अक्कलहुशारीने जमतील तेवढी समाधानकारक उत्तरं देत वेळ मारून न्यायची आणि त्या बोलतील ते ऐकून घ्यायची तयारी ठेवायची एवढंच माझ्या हातात होतं. तरीही क्षणाचाही वेळ न दवडता माझ्या डिपार्टमेंट संदर्भातल्या सर्व अद्ययावत माहितीच्या नोंदी मी भराभर आवश्यक त्या फाईल्स मागवून घेत माझ्या डायरीत नोंद करून घेतल्या आणि ‘आलिया भोगासी.. ‘ सादर व्हायला तयार झालो. तेवढ्यात घाईघाईने आलेला शिपाई माझ्या केबिनचं दार ढकलून आत येत वखरे साहेबांचा निरोप सांगून गडबडीने निघून गेला.

मॅडम आणि वखरेसाहेब ‘ब्रॅंच व्हिजीट’ आवरून परतीच्या वाटेवर होते आणि आम्हा सर्वांना दहा मिनिटांनी खाली पोर्चमधे येऊन थांबायचा तो निरोप होता! तिथून आम्हाला रिसिव्ह करून त्या दोघांच्या कार्समधूनच ते आम्हाला जवळच्याच हाॅटेलवर लंच मिटिंगसाठी घेऊन जाणार होते.

एखाद्या झंझावातासारख्या भिरभिरत राहिलेल्या या सगळ्या सकाळपासूनच्या घटनाक्रमात दोन दिवसांच्या हाकेच्या अंतरावर येऊन ठेपलेल्या माझ्या कथासंग्रहाच्या प्रकाशन समारंभाचं व्यवधान मीच त्याला दूर ढकलून दिलेलं असावं तसं मनाच्या एका अंधाऱ्या कोपऱ्यात गुपचूप पडून राहिलेलं होतं..!

आम्ही सर्वजण ब्रिफकेस हातात घेऊन ठरल्याप्रमाणे पोर्चमधे येऊन उभे राहिलो. त्यानंतर पाचच मिनिटांत दोन्ही कार्स झोकदार वळण घेत आमच्याजवळ येऊन अलगद थांबल्या आणि आम्हाला आत घेऊन दुसऱ्याच क्षणी रस्त्यावरच्या गर्दीत मार्गस्थही झाल्या!

माझ्या हाकेची वाट पहात सकाळपासून मनात एका कोपऱ्यात निपचित पडून राहिलेलं प्रकाशन समारंभाचं ते व्यवधान मॅडमच्या यापूर्वी आमच्या कधीच अनुभवास न आलेल्या छान, आनंदी मूडमधल्या गप्पा सुरू होताच निर्माण झालेल्या निश्चिंतपणाच्या स्पर्शाने जाग आल्यासारखं उभारून वर आलं. मी क्षणभर विचलीत झालो खरा पण तरीही त्याला अलगद दूर करत मी स्वत:ला सावरलं.

ती लंच मिटींग अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात सुरू झाली. मॅडमचा इतका आनंदी, प्रसन्न आणि मिष्किल मूड मी प्रथमच अनुभवत होतो. कसले प्रश्न नाहीत, उपदेशाचे डोस नाहीत, आरडाओरडा नाही, दमदाटी नाही… कामं, पेंडिंग मॅटर्स, टारगेटस् कश्शाकश्शाचे पुसटसेही उल्लेख नाहीत. मॅडमचं हे रूप मला अनोळखीच होतं. आजवरच्या मी अॅटेंड केलेल्या यापूर्वीच्या त्यांच्या असंख्य मिटींग्जमधला मॅडमचा थयथयाट आठवून तर या समोरच्या मॅडम म्हणजे त्यांचं मायावी रूपच असावं असंच वाटू लागलं. पण ते तसं नव्हतं. त्या त्याच होत्या! आज त्या प्रसन्नचित्त होत्या आणि कांहीशा हळव्याही झाल्या होत्या! त्याला कारणही तसंच होतं! त्या आता लवकरच दुसऱ्या एका राष्ट्रीयकृत बॅंकेच्या एम्. डी. पदाचा कार्यभार स्वीकारणार होत्या! हे सांगताना त्यांचा वरवर दिसणारा कडक आणि संतापीपणाचा मुखवटा आज त्यांच्याही नकळत गळून पडला होता! अर्थातच त्यामुळे त्या अतिशय मनापासून अगदी मोकळेपणाने बोलत होत्या!

बोलण्याच्या ओघात बॅंकिंग इंडस्ट्रीत येऊ घातलेल्या, संबंधित सर्वांवरच दूरगामी परिणाम करायला निमित्त ठरू शकणाऱ्या, आणि आमच्यासारख्या प्रत्येक स्टाफचं आयुष्य सावरू किंवा विस्कळीतही करू शकणाऱ्या अनपेक्षित अशा प्रचंड वादळाचं सूतोवाचही त्यांनी केलं आणि आम्ही सर्वजण सावध झालो!

मी त्यांचं सगळं बोलणं शांतपणे ऐकत असताना त्यातलं गांभीर्य आणि त्याचं महत्त्व मला लगेच जाणवलं नव्हतं हे खरं पण हळूहळू माझ्या मनातल्या नकळत सुरू झालेल्या विचारचक्राला वेग द्यायला तेच निमित्त ठरणार होतं आणि लगेचच माझ्या उर्वरीत आयुष्यालाही एका अनोख्या वळणावर आणून उभं करणार होतं! !

क्रमश:…  (प्रत्येक गुरूवारी)

©️ अरविंद लिमये

सांगली (९८२३७३८२८८)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ पाहुणा… ☆ सौ शालिनी जोशी ☆

सौ शालिनी जोशी

🔅 विविधा 🔅

☆ पाहुणा… ☆ सौ शालिनी जोशी

हरिपाठाच्या बाविसाव्या ओवीत संत ज्ञानेश्वर म्हणतात,

हरिविण जन्म तो नर्कची पै जाणा l यमाचा पाहुणा प्राणी होय ll

येथे यमाचा पाहुणा म्हणजे काय असा प्रश्न पडतो. पाहुणा याचा सामान्य अर्थ आपण अतिथी, अभ्यागत किंवा प्रसंगी विशेषी घरी आलेली किंवा बोलावलेली व्यक्ती असा घेतो. यम तर मृत्यूदेवता मग तिच्याकडे कोण पाहुणा म्हणून जाणार?  आणि तिथे आदर सत्कार तरी असला?  आपल्या घरी जे असेल ते आपण आल्या गेल्याला देतो. त्यात त्यांनी समाधानी असाव ही इच्छा असते. पण यम तर कर्माप्रमाणे फळ देणारा आणि पापाचा घडा भरल्यावर मृत्यू लोकातून यमलोकात नेणारा. म्हणजे हा पाहुणचार यम देईल ती शिक्षा भोगण्याचा आहे. पाप संपेपर्यंत शिक्षा भोगायची मग परत मृत्यू लोक, परत यमलोक. अशा या येरझाऱ्या म्हणजे यमाचा पाहुणचार.

तर याच हरिपाठाच्या सत्ताविसाव्या ओवीत संत ज्ञानेश्वर म्हणतात,

तीर्थी भाव धरी रे करूणा l शांती त्या पाहुणा हरी करी ll

मनापासून तीर्थयात्रा करणाऱ्याच्या अंतःकरणात हरिकृपेने करुणा व शांती पाहुण्या होऊन येतात. म्हणजे त्याच्याकडे मुळात नसलेले गुण शांती आणि करुणा त्याला तीर्थयात्रेमुळे प्राप्त होतात.

ज्ञानेश्वरीत संत ज्ञानेश्वर म्हणतात,

शांताचिया घरा अद्भुत आला आहे पाहुणेरा l

पाहुणेरा म्हणजे पाहुणा. मुळात शांतरसात असलेल्या अकराव्या अध्यायात काही वर्णने अद्भुत रसातील आहेत. मुळात नसताना या अध्याया पुरता डोकावला आहे, म्हणून अद्भुत रस पाहुणा. या दोन तीन उदाहरणावरून लक्षात येतं पाहुणा याचा अर्थ किती व्यापक आहे. तो व्यक्तिपुरता मर्यादित नाही. कोणतीही कायम नसलेली गोष्ट मग ती सजीव, निर्जीव, भावना असली तरी, जेव्हा नवीन येते किंवा व्यक्त होते तेव्हा ती पाहुणा होते. म्हणून एखादा डास, ढेकूण जरी अचानक दिसला तरी आपण त्याला पाहुणा म्हणतो. हे त्रासदायक पाहुणे.

कावळा दाराबाहेर ओरडला की पाहुणा येणार अशी अंधश्रद्धा आहे. पूर्वी सुट्टीत मामा, मावशीकडे जाणे ते पाहुणे म्हणून. तसेच लग्नआदि समारंभासाठी येणारे सर्व पाहुणेच. यावरून पै पाहुणे, पाहुणेरावणे असे जोडशब्द तयार झाले. लग्नाला आलेल्या पाहुण्याला काही वेळा वधू वर दोन्ही कडचे लोक ओळखत नाहीत. त्यामुळे दोन्हीकडून दुर्लक्ष होते. बिचाऱ्याला जेवणही मिळत नाही. म्हणून म्हण पडली ‘दोन्हीकडचा पाहुणा उपाशी’. एक पाहुणा आला तर घरातले वातावरण बदलते. म्हणून म्हणतात ‘एक पाहुणा तर घर पाहुणे’ किंवा ‘व्याही पाहुणा आला तर रेडा दुभत नाही’. अशा कितीतरी म्हणी तयार झाल्या.

काव्यातही या पाहुण्याला स्थान आहे.

येता पाऊस पाहुणा आलं हिरवं उधाण l येथे पाऊस पाहुणा झाला.

विठ्ठल पाहुणा आला माझ्या घरा l येथे विठ्ठलच पाहुणा होतो.

आज ये अंगणा पाहुणा गोजिरा l अंगणात येणारा पक्षीच पाहुणा होतो.

भगवंत भुकेला भक्तीचा पाहुणा l भगवंतालाच पाहुणा केला.

कायसेनि पाहुणेरू क्षीरसागरा l क्षीरसागराला कशाचा पाहुणचार?

गणपतीलाही दीड ते अकरा दिवसाचा पाहुणा म्हटले जाते. म्हणजे कुणाला पाहुणा म्हणाव याला काही बंधन नाही. मग शाळेत कार्यक्रमाला बोलावलेल्या अध्यक्षांनाही पाहुणे म्हणतात. सरकारी अधिकाऱ्यालाही सरकारचा पाहुणा म्हणतात. अशा प्रकारे विचार करायला गेलं तर नेहमीच्या वापरात या शब्द ‘पाहुणा’. पण अर्थ सांगायला गेलं तर विस्तार आवरत नाही. असे हे मराठी भाषेचे वैभव म्हणावे लागेल.

©  सौ. शालिनी जोशी

संपर्क – फ्लेट न .3 .राधाप्रिया  टेरेसेस, समर्थपथ, प्रतिज्ञा मंगल कार्यालयाजवळ, कर्वेनगर, पुणे, 411052.

मोबाईल नं.—9850909383

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ उगवतीचे रंग – नॉर्मन कझिन्स.. मूर्तिमंत सकारात्मकता ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्री विश्वास देशपांडे

? विविधा ?

☆ उगवतीचे रंग – नॉर्मन कझिन्स.. मूर्तिमंत सकारात्मकता ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

नॉर्मन कझिन्स हा एक अमेरिकन पत्रकार, प्राध्यापक आणि जागतिक शांततेचा खंदा पुरस्कर्ता! त्याची कथा मोठी विलक्षण आणि प्रेरणा देणारी आहे. अमेरिकेतून निघणाऱ्या The Saturday Review चे ते दीर्घकाळ संपादक होते. त्यांची दोन पुस्तके म्हणजे कोणत्याही कारणाने आयुष्यात निराश झालेल्या माणसाला मार्ग दाखवणारा दीपस्तंभ. The Anatomy of Illness, Head First आणि The Healing Heart ही त्यांची गाजलेली पुस्तके. या पुस्तकातून त्यांची जीवनगाथा लोकांसमोर आली.

नियती एखाद्या माणसाची किती कठोर परीक्षा घेऊ शकते ते नॉर्मन कझिन्स यांच्या आयुष्याकडे पाहिले म्हणजे लक्षात येते. १९६४ मध्ये त्यांना अँकीलोझिंग स्पॉन्डीलाईटीस हा दुर्मिळ आणि दुर्धर आजार झाला. स्नायू आणि सांध्यांच्या आजाराने या माणसाला बिछान्याला जखडून ठेवले. आपल्या कामात नेहमी कार्यरत राहणाऱ्या या उत्साही माणसाला अंथरुणाला खिळून राहावे लागले. डॉक्टरांनी त्यांच्या आजाराचे निदान केले आणि त्यांना सांगितले की हा अत्यंत दुर्मिळ आणि दुर्धर असा आजार आहे यातून बरे होण्याची शक्यता अत्यंत कमी. पाचशे व्यक्तीतून एखादीच व्यक्ती या आजारातून वाचू शकते.

त्याच्या आजाराचे हे निदान करणाऱ्या डॉक्टरांनी त्यांच्या आयुष्यात हा आजार झालेला एकही रुग्ण बरा झालेला पाहिला नव्हता. डॉक्टरांचे आपल्या आजाराविषयीचे हे बोलणे ऐकल्यानंतर एखादी व्यक्ती हादरून गेली असती, निराश झाली असती, खचली असती. अशा व्यक्तीने मग एकतर आता आपले काही खरे नाही म्हणून मृत्यूला तोंड देण्याची तयारी केली असती किंवा आत्महत्येचा मार्ग पत्करला असता. पण नॉर्मन कझिन्स यांची जगण्याची इच्छा दुर्दम्य होती, प्रचंड आशावाद होता, आजाराला आणि मृत्यूला हरवण्याची ताकद त्यांच्या मानसिकतेत होती. त्यांनी असा विचार केला की ५०० मधील एक व्यक्ती तरी वाचते ना! मग ती व्यक्ती आपणच का असू नये?

नॉर्मन यांचे वैद्यकीय ज्ञान तर अफाट होतेच परंतु मानवी मनाचा देखील त्यांचा अभ्यास होता. विचार करताना त्यांना असे आढळून आले की भय, दुःख, शोक यासारख्या भावनांचा आपल्या शरीरावर तात्काळ परिणाम दिसून येतो. जेव्हा प्रचंड भीतीची भावना मनात निर्माण होते तेव्हा हृदयाची धडधड वाढते, छातीचे ठोके वाढतात. दुःख आणि शोक या भावनांचे देखील विपरीत परिणाम लगेच जाणवतात. या नकारात्मक भावनांचे जर असे परिणाम होत असतील तर आनंद, हर्ष, उल्हास, उत्साह, प्रेम, आशा, विश्वास यासारख्या सकारात्मक भावना आपल्या शरीरावर चांगले परिणाम नक्कीच करू शकत असतील. आणि बरे होण्यासाठी याच भावनांचा आश्रय घेण्याचे त्यांनी ठरवले. रुग्णालयाच्या निराशाजनक वातावरणातून बाहेर पडून आपल्या स्वतःची उपचार पद्धती त्यांनी स्वतःच ठरवली. त्यात आशावादी राहणे, दिवसातून दहा मिनिटे तरी खळखळून हसणे आणि व्हिटॅमिन सीचा डोस घेणे या गोष्टींचा प्रयोग त्यांनी सुरू केला. या गोष्टींचे आश्चर्यकारक परिणाम त्यांना मिळाले. हास्यामुळे एंडॉर्फिन या सकारात्मक आणि उपयुक्त हार्मोन्स निर्मिती होते. त्यांना असे आढळून आले की दहा मिनिटांच्या खळखळून हसण्यामुळे आपल्या वेदना कमी होतात आणि शांत झोप लागते. त्यामुळे वेदनाशामक औषधे घेणे त्यांनी थांबवले. त्यांनी मग काही विनोदी चित्रपटांच्या कॅसेट्स मागवल्या. काही विनोदी पुस्तके मागवली. दुर्दम्य इच्छाशक्ती, सततचे प्रयत्न यामुळे ते चक्क या आजारातून बरे झाले.

त्यांच्या या अनुभवातून जन्माला आले ते Anatomy of Illness हे त्यांचे पुस्तक! आपल्या वेदनांचे रडगाणे न गात बसता या माणसाने त्याचे सुंदर गाणे केले आणि जगाला सकारात्मक राहिल्याने काय होऊ शकते याचा संदेश दिला. आपलं मन, शरीर आणि आत्मा यांचा अतूट संबंध आहे हा संदेश दिला. या गंभीर आजारातून पूर्णपणे बरे झाल्यानंतर त्यांनी अनेक वर्षे युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्नियामध्ये मेडिकल ह्युमॅनिटीजचे प्राध्यापक म्हणून काम केले.

या माणसाची पुढे नियतीने आणखी परीक्षा घेतली. या गंभीर आजारातून बरे झाल्यानंतर १६ वर्षांनी त्यांना हृदयविकाराचा झटका आला. डॉक्टरांनी त्यांना अँजिओग्राफी करून बायपास करायला सांगितले. परंतु त्यांनी डॉक्टरांच्या या सल्ल्याकडे दुर्लक्ष करून आपल्या हृदयाची स्वतःच बायपास शोधण्याची क्षमता असते या गोष्टीवर विश्वास ठेवला. पुन्हा एकदा सकारात्मक जीवनशैली, आहार, व्यायाम या गोष्टींवर भर देऊन हृदय रोगावर मात केली. यावेळी त्यांचे वय ६५ वर्षे होते. यानंतर दहा वर्षे ते सर्वसामान्य व्यक्तीप्रमाणे त्यांनी आयुष्य व्यतित केले. त्यांना गोल्फ टेनिस खेळण्याचे आवड होती. ते खेळणेही त्यांनी सुरू ठेवले होते. त्यांच्या अनेटॉमी ऑफ या इलनेस या पुस्तकावर आधारित त्यांच्या जीवनावर एक चित्रपट देखील निघाला. ३० नोव्हेंबर १९९० रोजी त्यांनी या जगाचा निरोप घेतला.

आपल्या जीवन जगण्याच्या पद्धतीतून त्यांनी आधुनिक वैद्यक शास्त्राला हा संदेश दिला की बरे होण्यासाठी फक्त औषधोपचार आणि शस्त्रक्रिया याच गोष्टी पुरेशा नसतात तर मानवी मनाचा सहभाग त्यात अतिशय महत्त्वाचे काम बजावतो. त्यांनी जगाला हा संदेश दिला की एकदा तुमचे मन दुर्दम्य इच्छाशक्ती आणि आशावादाने भरले की तुमचे शरीर देखील तुमच्या या इच्छाशक्तीला साथ देऊ लागते तुमचे सर्व अवयव त्यानुसार कार्य करू लागतात. कुठल्याही आजाराकडे संकट म्हणून न पाहता एक आव्हान म्हणून त्याचा स्वीकार करा आणि हसतमुखाने त्याला सामोरे जा. आज छोट्या छोट्या गोष्टींनी निराश होणाऱ्या आणि आत्महत्येचा सोपा मार्ग स्वीकारणाऱ्या तरुणांना नॉर्मन कझिन्स यांचे आयुष्य म्हणजे एक मोठा सकारात्मकतेचा संदेश आहे.

© श्री विश्वास देशपांडे

चाळीसगाव

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “क्ष…” ☆ श्री कौस्तुभ परांजपे ☆

श्री कौस्तुभ परांजपे

? विविधा ?

☆ “क्ष…” – भाग – ३ ☆ श्री कौस्तुभ परांजपे

क्ष…  481

अक्षर ओळख करतांना अगदी क्ष किरणासारखा शिरलेला हा क्ष तंबूत शिरलेल्या उंटासारखा ठाण मांडून बसला आहे. अनेक शब्दात तो येतो.

सुरुवातीला सुटे, दशक…… लक्ष, दशलक्ष यापासून अंकात आला, मग क्ष ची किंमत काढा अस म्हणत गणितात शिरला. लक्ष देण्यावरून मनात बिंबला. पुढे पुढे तर भाषा बदलत एक्स आणि वाय अक्ष असा क्ष आणि य करत आलेखाच्या कागदावर पण अवतरला. आणि इथेच आमचा वाढत जाईल अस वाटणारा आलेख क्ष आणि य या दोन्ही अक्षावर क्षय ग्रस्त झाला. य अक्षावर तो वाढला नाही. क्ष अक्षावर तो पसरलाच नाही.

गणितात या क्ष ची किंमत शोधावी लागली. तर मित्रांमधे बरीचशी गुपितं सांगणारी व्यक्ती ही क्ष च असायची. क्ष व्यक्तीने सांगितल असं म्हणत त्या व्यक्तीच नांव गुप्त ठेवलं जायचं.

क्षमा या शब्दात तो नम्रता आणि मोठेपणा घेऊन आला, तर क्षोभ या शब्दात जहालपणा शिकवून गेला. क्षय या शब्दात अस्ताकडे जाणारा वाटला, तर क्षीण मधे तो कमजोर झाला. क्षेमकुशल विचारतांना प्रेमासोबत भावनांसह वावरला. तर क्षमता सिध्द करतांना सगळ्या गोष्टींवर मात करण्याची हिंमत देणारा ठरला.

तो साक्षरात आहे, निरक्षरातही आहे. क्षणात आहे, लक्षणात आहे. विलक्षणातही आहे. लक्ष आणी लक्ष्य यात आहे, पण सगळीकडे अर्थ वेगळा आहे. तो एकटा आला तसाच जोडाक्षरात पण आला. तीक्ष्ण मधला टोकदार वाटला, सुक्ष्म मधला शोधावा लागला.

तो पक्षात जाणवला, भक्षात गिळंकृत करून गेला. कधी कधी तो लक्षात आला नाही. आणि भक्तीत साक्षात दिसलाच नाही. संस्कृत मधे क्षीर या पदार्थाच्या नावाने आला, तर पदार्थ विज्ञानात क्षार नावाने मिसळला. क्षेत्रीय आणि क्षत्रिय यातही आला. वृक्षात सावली धरली, रुक्षात निरस वाटला, क्षितीजात विस्तीर्ण जाणवला.

अशा पध्दतीने क्ष हा अक्षर ओळखीपासून ओळखापाहू या वेगवेगळ्या सदरात वेगवेगळ्या पध्दतीने येतच राहिला.

©  श्री कौस्तुभ परांजपे

मो 9579032601

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ दुनिया जिंकण्या आधी स्वतःला जिंकूया! ☆ श्री हेमंत तांबे ☆

श्री हेमंत तांबे 

🔅 विविधा 🔅

दुनिया जिंकण्या आधी स्वतःला जिंकूया! ☆ श्री हेमंत तांबे 

तुम्हाला ते मुकेश अंबानींचं “दुनिया मुठ्ठी में” हे वाक्य आठवतं काय? दुनिया मुठीत ठेवून तुम्ही काय मिळवता? आणि खरंच तशी ती तुमच्या मुठीत येते काय?

इतिहास ते आज वर्तमान जर आपण समाजाचं बारीक निरीक्षण केलं तर दिसून येईल की, माणसाचं आयुष्य म्हणजे एक धावण्याची निरंतर स्पर्धा झालंय. प्रत्येकजण काहितरी जिंकण्यासाठी धावतोय. कोणी पैसा धन दौलत मिळवण्यासाठी धावतोय, तर कोणी सत्ता अधिकार मिळवण्यासाठी धावतोय. कोणी स्वतःचं नाव होण्यासाठी प्रसिद्धी किर्ती मिळवण्यासाठी धावतोय, तर कोणी दुसऱ्याला प्रभावित करण्यासाठी धावतोय! तुम्ही एक लाख लोकांना विचारलंत की, “सफलता म्हणजे निश्चित काय? ” तर 99. 99% लोक सांगतील दुसऱ्याच्या पुढं जाणं, दुसऱ्याला हरवणं, दुसऱ्या पेक्षा जास्त काहितरी मिळवणं म्हणजे सफलता! … जर आपण बारकाईनं लक्ष दिलं, नव्हे द्या. तर आपल्याला दिसून येईल की, दुसऱ्याला जिंकण्याच्या नादात किंवा या रॅट रेस मध्ये तुम्ही आतून हरलेले असता, आतून तुम्ही भिकारी झालेले असता. करोडो रुपये तुमच्या कडे असूद्यात, लोकांकडून तुमच्या विजयासाठी टाळ्यांचा कडकडाट होवो, आपल्या मनाला जोपर्यंत आपण जिंकत नाही, तोपर्यंत आपण शांत समाधानी आनंदी नसतो. कारण अंततः तुम्ही एकटेच असता आणि एकट्यालाच तर जगायचं असतं!…

तुमच्या रात्रीची झोप, तुमच्या हृदयातील शांती, तुमच्या आतील मौन आणि ध्यान हिच तर तुमची खरी धन, दौलत, संपदा असते. पण आपण बाह्यांगी पाहिलं तर आपण जगभर वेगवेगळ्या गोष्टींसाठी धावत असतो, जग जिंकण्याची, सर्वोच्च होण्याची, प्रत्येकावर अधिकार गाजवण्याची आपली इच्छा पूर्ण होतच नाही. विजय जेवढा मोठा, आपली इच्छा त्याहून मोठी होत जाते. आज तुम्ही एक स्पर्धा जिंकलीत तर उद्या दुसरी स्पर्धा आयोजित झालेली असते. बाहेरचा विजय अंतहीन आहे, बाहेरची स्पर्धा अंतहीन आहे, कारण ती तुमच्या इच्छेवर इर्षेवर अवलंबून आहे. खरं म्हणजे आपल्या आतील युद्धभूमीवर आपण मिळवलेला विजय महत्वाचा. तिथला विजय आपल्याला सौंदर्य, तृप्ती, शांती, आनंद देतो. जी व्यक्ती तिथं जिंकते त्या व्यक्तीचं जीवनच एक उत्सव बनून जातं! तुकोबा म्हणतात तसं, “निरंजनी आम्ही बांधियेले घर | निराकार निरंतर राहिलो आम्ही || निराभास पूर्ण झालो समरस | अखंड ऐक्यास पावलो आम्ही ||” असं काही वैचारिक मंथन करताना कुणाचं नाव घेऊ नये, लालबागच्या राजा समोर त्याच्या भक्तांचे जोडलेले हात आणि चेहरे पाहा, थोडक्यात त्यांची देहबोली पाहा. ते दीन, पतित, अन्यायी, हरलेले किंवा त्यांची भावमुद्रा अतृप्त दिसते. खरं म्हणजे माझं जे इष्ट आहे त्यासमोर मी दीन, दरिद्री, दुःखी, अगतिक असेनच कसा? तिथं तर माझा चेहरा शांत, समाधानी किंवा आनंदानं उत्फुल्ल झालेला दिसला पाहिजे ना? त्या राजा समोर मी तर राजा सारखाच जाईन… कारण माझं तर त्याच्या कडे काही मागणंच असणार नाही, मला तर कसलीही हाव नाही आणि हाव तर तोही पूर्ण करू शकत नाही! … लक्षात ठेवा, मनाच्या गाभाऱ्यातील शांतता कधीही बाहेरून आत येत नाही. तुम्ही ज्ञानेश्वर, बुद्ध, महावीर, कृष्ण, राम यांचे चेहरे पाहा. तुम्हाला तृप्ती आणि शांती आतून बाहेर पडताना दिसेल. कारण बाहेरचं जिंकणं अस्थायी असतं, आज तुम्ही जिंकलात तर उद्या दुसरा कुणी जिंकेल. आज तुम्ही सर्वांत पुढं असाल तर उद्या दुसरा कोणी पुढं असणारच. बाहेरचं जिंकणं फक्त आणि फक्त तुमचा अहंकार वाढवतं, ज्यानं तुम्हाला आतून जास्त पिडा सुरू होते. म्हणून प्रथम आपण आपल्या मनाला जिंकलं पाहिजे. समर्थ रामदास कधीही दुसऱ्याला उपदेश करत नाहीत, तर मना सज्जना… ! म्हणून आपल्या मनाला उपदेश करताना दिसतात.

आपल्या आत क्रोध, वासना, इर्षा, हाव असते. जर यांना तुम्ही ओळखलं नाहीत, तर तुम्ही यांचे गुलाम होणारच. त्यामुळे बाहेरचं यश, पद, पैसा, प्रतिष्ठा तुम्हाला दास म्हणूनच वागवणार. समजा एखाद्यानं भरपूर धन दौलत मिळवली, पण रागात आपल्याच परिवाराला दुःखी केलंत तर? तुम्ही सत्तेची खुर्ची जिंकता, पण तिच खुर्ची दुसरा कुणी घेईल म्हणून तुम्ही सुखानं झोपू शकत नाही. आता सांगा हे जिंकणं झालं की हरणं? तुम्ही याला विजय म्हणू शकता का? तर नाही, हा पराभवच आहे. भले पूर्ण दुनिया तुम्हाला विजेता म्हणूद्या… तुम्ही खरे विजयी होता, जेव्हा तुम्हाला आंतरिक तृप्ती, समाधान, शांती मिळते! जे तुमच्या जवळ आहे त्यात तुम्ही सुखी, संतुष्ट, प्रसन्न असता, तेव्हा तुमच्या हृदयातील प्रेमाचा पाझर सुरू होतो, तेव्हा तुम्ही दुसऱ्याशी लढू शकत नाही किंवा लढू इच्छित नाही. लक्षात ठेवा जिंकणं दुसऱ्याच्या विरोधात असून असं चालेल? ते तर, आपल्याच भरकटलेल्या मना विरोधात असलं पाहिजे. जेव्हा आपण आपल्या मनावर विजय मिळवतो, तेव्हा बाहेरील जग स्वतः बदलतं. आता तुम्हाला दुसऱ्या कुणावर विजय मिळवण्याची गरज नसते, तर तुमचं जगणं हेच विजय झालेलं असतं! … जिंकण्याचा खरा अर्थ हा आहे की, आपल्या मनावर विजय मिळवणं. फारच कठीण आहे हे, पण जमलं तर फारच सुंदर आहे, तेव्हा तुम्ही खरे राजे असता. तुमच्या डोक्यावर मुकुट नसूदे, बसायला सिंहासन नसूदे, कोणी दासदासी किंवा सैन्य साम्राज्य नसूदे. राजा तर तुम्हीच असता, तुमच्या राज्याचा विस्तार व्हायला सुरुवात झालेली असते, हिच सुरूवात असते तुम्ही आनंदयात्री होण्याची!

गरज नसताना आपण दुसऱ्याला आपला प्रतिस्पर्धी मानत असतो, कधी भावाला तर कधी शेजाऱ्याला, कधी समाजाला तर कधी राजकीय सामाजिक अस्तित्वाला. आपण असं समजून जातो की यासर्व गोष्टी मला साह्यभूत होतील, तर आपण जिंकू आणि पुढं जाऊ. पण जरा थांबा व शांतपणं विचार करा की, कधी बाहेरची परिस्थिती तुम्हाला दुःखी करते? की दुःखाचं खरं कारण आपल्या अंतरंगात दडलंय? आपले खरे शत्रू बाहेर नसून आपल्या आतच असतात. आपल्यातील राग, अहंकार, मत्सर, द्वेष आपली मुळ शांतवृत्ती, तृप्ती, समाधान यांना नष्ट करत असतात. समोरच्यानं शिवी दिली तर आपण रागावतो (मी सुद्धा) पण त्या शिवीनं खरी जखम कुणाला झालेली असते? तर जखम आपल्यातील अहंकाराला झालेली असते. आता क्रोध तुमचा ताबा घेतो आणि पुढील गोष्टी घडत जातात. लोभ तुम्हाला गुलाम बनवतो आणि इर्षा तुमच्या हृदयात आग लावते. हे तर आपले जवळचे शत्रू आहेत. आपल्या मनाची शांती, आपली झोप हेच तर घालवतात!

आपण जिथं शरिरानं असतो तिथं खरं म्हणजे मनानं नसतो. आता आपलं पुढील ध्येय काय? पुढील पद कोणतं? आता कशावर, कुणावर आणि कसा विजय मिळवायचा? कुणाचा प्रतिकार कसा आणि कुणा मार्फत मोडून काढायचा? ही तुमची बेचैनीच सांगून जाते की, खरा पराभव तुमच्या आत झालेला आहे. तुम्ही ज्याला अलेक्झांडर द ग्रेट म्हणता, ज्यानं अख्ख्या जगाशी लढाई केली, ज्यानं दुसऱ्यांना हरवलं, तो खरा म्हणजे अलेक्झांडर द ग्रेट इडियट होता. रात्री तो शांत झोपत नसे. आपल्याच सैन्यातील कोणी उठाव करील म्हणून कायम चिंतेत असायचा. त्याचे विचार चिंता यामुळं तो कायम अस्वस्थ असायचा. बाहेर मिळालेल्या विजया नंतरही आत तो हरलेला माणूस होता. हाच त्याचा खरा पराभव होता. तो जिथं जिथं गेला, तिथं तिथं त्यानं तलवारीच्या जोरावर राज्ये जिंकली. पण गोष्ट इथं संपत नाही. जग जिंकत जिंकत तो जेव्हा मृत्यूच्या द्वारावर गेला तेव्हा त्याला सार्वजनीन सत्याचा बोध झाला. एका चिरंतन सत्याची जाणीव त्याला झाली. त्यानं पूर्ण जग जिंकलं असेल किंवा नसेल, पण एवढं निश्चित की, जगज्जेता अलेक्झांडर हरला होता आपल्याच मनासमोर! त्याला स्वतःवर विजय मिळवता आला नाही. खरंतर त्याचं स्वप्न प्रत्यक्षात आलं नाही. विचार करा, ही केवढी मोठी विटंबना आहे की, जगज्जेता अलेक्झांडर हरला होता आपल्याच मनासमोर, त्याची इच्छा अपूर्णच राहिली, त्याच्या आत्म्याला शांती मिळाली नाही! जोपर्यंत तुम्ही आपले आंतरिक शत्रू कोण आहेत हे ओळखून त्यावर विजय मिळवत नाही, तोपर्यंत तुम्ही पराजयीच असता. आतले शत्रू तलवारीनं नाही, तर बोधानं जिंकले जातात. पण हा बोध होण्यासाठी बुद्ध म्हणतो ध्यानात जा, महावीर म्हणतो मौनात जा आणि कृष्ण म्हणतो योग आचरा. थोडक्यात आपल्या मनाशी संवाद साधा. अलेक्झांडर द ग्रेट इडियटला मरण्यापूर्वी काहीच काळ आधी बोध झाला. त्यानं त्याच्या अंतकाळी सर्वांना सांगितलं, “माझी तिरडी जेव्हा बांधाल, तेव्हा माझे हात तिरडी बाहेर दिसूद्यात. जगाला कळूदे की अलेक्झांडर द ग्रेट रिकाम्या हातानं गेला! ” अलेक्झांडर द ग्रेट इडियटचा मृत्यू आपल्याला ही शिकवण देतो की, तुम्ही कितीही प्रतिष्ठा, संपत्ती, साम्राज्य मिळवा शेवटी सर्व इथंच राहाणार आहे. सोबत जाणारच असेल तर तो तुमचा जीवनानंद! … आपल्याला अलेक्झांडर द ग्रेट इडियट होऊन चालणार नाही. आपल्याला आपल्या आतील युद्धभूमीवर विजय मिळवायचा आहे. जर आपण वासना, राग, लोभ, द्वेष व अहंकारावर विजय मिळवला तर, आणखी कशावरही विजय मिळवण्याची आवश्यकता नाही… दुनिया जिंकण्या आधी स्वतःला जिंकूया! 🙏

© श्री हेमंत तांबे

पाटगाव. 

मो – 9403461688

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares