मराठी साहित्य – विविधा ☆ “आईपणाच्या कळा!” ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? विविधा ?

☆ “आईपणाच्या कळा!” ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

मुलं जसजशी मोठी होत जातात तसतसा आईच्या अंगणातला किलकिलाट कमी कमी होत जातो! एक शांतता भरत भरत जाते मनाची विहीर. घर अबोल होऊ लागतं… आणि या अबोलपणाचा अदमास आईला आधी आलेलाच नसतो….काळीज मूर्ती नसलेल्या गाभा-यासारखं होतं!

मुलांना त्यांचं त्यांना सारं काही करता येऊ लागलेलं असतं…त्यामुळे त्यांनी आईला काही विचारावं अशी गरज उरलेली नसते. मुलं आईशिवाय जगू पाहत असतात आणि त्यात त्यांना सावकाश का होईना…एक गती प्राप्त होत जाते…आईचं बोट सोडलं तरी आपण भेलकांडत नाही हे त्यांना उमगत जाते.

आई हसते…कारण मुलांनी स्वतंत्र पंखांनी आभाळात विहार करावा हीच तर तिची आंतरिक इच्छा असते….पण तरीही तिच्या आत काही तरी तुटत असतं!

लहान मुलांची आणि मोठ्या मुलांची आई असणं यात खूप फरक असतो. लहानग्यांचं काही चुकलं तर आई बोलू शकते…मोठ्यांच्या चुका बघत राहाव्या लागतात… सवयीने ओठांवर आलेले सल्ल्याचे शब्द गिळून टाकावे लागतात. मुलं हाकेला सहजी ओ देत नाही हे माहीत झाल्याने त्यांना हाक मारण्याआधी दहादा विचार करावा लागतो… आता त्यांच्या आयुष्यात लुडबूड होणार नाही अशी काळजी घेत घेत प्रेम करायला शिकावं लागतं आईला! डोंबा-याची पोर अधांतरी बांधलेल्या दोरीवर तोल सावरत सावरत एक एक पाऊल टाकीत दुस-या टोकाला जात असते….डोंबारीण ढोलकी बडवत असली तरी तिचं सारं लक्ष पोरीच्या पायांकडे असते…काही झालंच तर आपण काहीही करू शकणार नाही…ही जाणीव तिचं आतडं कुरतडत असतं! पण ज्याची वाट त्यानंच चालायची असते… हेही तिला मनोमन ठाऊक असते.

मुलं आईला काही गोष्टी सांगतात कधी कधी…पण कधी कधीच. आणि त्यांचं हे असं कधीकधी व्यक्त होणं तिला टोचत असतं… पण ती ते सांगत नाही! आपण आता यांच्या आयुष्यातलं एकमेव झाड नाही आहोत सावली देणारं… ही भावना मूळ धरू लागते.

पण तरीही त्यांनी याच झाडाखाली विसाव्याला यावं… कारण झाडालाही सवयीचं झालेलं असतं. मुलांना बाहेरच्या,दुस-याच्या हातची चव माहीत झालेली किंबहुना माहीत करून घ्यावी लागलेली असते… आईचा हात काही कायमचा हात राहणार नाही… हे त्यांनी बहुदा समजून घेतलेलं असतं. तरीही आई त्यांच्या आवडीचं काहीबाही त्यांच्या पानात वाढत राहतेच. त्यांच्या लहानपणीचे फोटो उगाचच बाहेर काढून त्यांवरची धूळ झटकत राहते… तिला ती चित्रं जुनी होऊ द्यायची नसतात! पोरांना सुखाचं ठेव… अशी आर्जवं आई करीत असतेच… पोरांना त्यांची त्यांची प्रार्थना म्हणायची असतानाही! पण काळजी करायचं आईचं काळीज काही थांबवत नाही..थांबवू इच्छित नाही! फक्त ही काळजी आता स्पर्शातून नाही…तर मनातून वाहू लागलेली असते….आणि नेमका हाच प्रवाह नजरेआड होऊन जातो पोरांच्या! पण त्यांना हे ठाऊक नसतं… त्यांच्या ओढ्यांना आलेल्या वेगवान प्रवाहात याच विहिरीतलं पाणी झिरपत झिरपत उतरलेलं असतं… आणि हा अंतस्थ प्रवाह चिरंजीव असतो… ही सरस्वती गुप्त असली तरी वाहती मात्र असते!

आपण मुलांच्या केंद्रस्थानी राहिलेलो नाही आहोत…हे स्विकारून त्यांच्यावर तसंच प्रेम करीत राहणं…त्यांना आपल्या डोळ्यांच्या केंद्रस्थानी ठेवून न्याहाळत राहणं…हे आई करीत राहते…तिच्या प्रेमाला आता प्रतीक्षा करायची सवय करून घेणं अपरिहार्य झालेलं असतं.. न जाणो कधी मूल हाक देईल…ओ देण्यासाठी आपण तयार असायला पाहिजे!

(Sacred Divine Feminine वेब पेज वरील मजकुराचे स्वैर मराठी रुपांतरण. सहज वाचनात आलेले काही. – संभाजी बबन गायके.)

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ पाऊले…☆ सौ शालिनी जोशी ☆

सौ शालिनी जोशी

🔅 विविधा 🔅

☆ पाऊले… ☆ सौ शालिनी जोशी

माझी मुलगी भक्ती म्हणाली मला मोत्याची गौरीची पावले करायची आहेत. मनात आले का बरे असावे एवढे पावलांना महत्त्व गौरीचे पावले, संतांचे पाय,भगवंताचे पद,सद्गुरु चे चरण,महात्म्यांच्या पादुका अशा विविध प्रकारे आपण पावलांचा उल्लेख करतो.

याला कारण पाय हे अधिष्ठान आहेत.त्याचे वर सर्व शरीराचा भार म्हणजे शरीराचे सर्व कर्तुत्व सामर्थ्य या पायात सामावलेले.म्हणून चरणांच्या किंवा चरण चिन्हांच्या दर्शनाने त्या महात्म्याच्या सामर्थ्याचा प्रत्यय येतो.पदस्पर्शाने किंवा त्यावर डोके ठेवल्याने ते सामर्थ्य आपल्यात प्रवाहित होते असे म्हणतात.हीच चरणांची महती म्हणून संतांच्या प्रत्यक्ष मूर्ती नसल्या तरी चालतात. त्यांच्या पादुकांना चरणांच्या प्रतिमेला नमन केले जाते.क्षेत्राच्या ठिकाणी त्या त्या संत महात्म्यांच्या पादुका असतात. त्यांच्या पदस्पर्शाने ती भूमी पावन झालेली असते. त्याचे क्षेत्र होते.अशा संतांच्या पदस्पर्शाने तेथील रजःकणही पावन होतात त्यांचे वास्तव्य सूक्ष्म रूपाने तेथे राहते.

पुराणकथातही चरणांचे महत्त्व सांगितले आहे. रामाच्या पदस्पर्शाने गौतम पत्नी अहिल्याचा उद्धार झाला. ती शाप मुक्त झाली. तर वामन अवतारात भगवंतांनी चरणाने बळीला पाताळा ढकलले. राम वनवासात गेल्यावर लक्ष्मणाने रामाच्या पादुका सिंहासनावर ठेवून राज्य केले.

गौरीच्या पावला नाही असेच महत्त्व आहे.गौरी घरात आणण्यापूर्वी तिच्या मार्गावर हळदीकुंकू व रांगोळीची पावले काढली जातात. त्यावरून ती घरात येते हा तिच्या स्वागताचा प्रकार.मान सन्मानाने तिला घरात आणून या पावलावरून घरभर फिरवले जाते. घरातले वैभव दाखविले जाते.तिचा वास अखंड घरात असावा म्हणून ही पावले नेहमी आत येणारी असतात आणि बाहेर जाणारी अलक्षमीची. कोणी श्रेष्ठ पूज्य व्यक्ती घरी आल्यास त्याची पाद्य पूजा करतात लग्नातही जावयाचे व बहिणीचे पाय धुतले जातात यात त्यांच्या सन्मानाचा हेतू असतो.आदर व्यक्त केला जातो. लग्नातील सप्तपदी हा विधी दोघांनी आयुष्यभर सहकार्याने एकमेकांच्या पावलावर पाऊल ठेवून चालावयाचे आहे असे दाखवतो.

पावलावर पाऊल ठेवणे असा एक वाक्प्रचारही आहे म्हणजे चांगल्या माणसाचा आदर्श ठेवून तसे वागणे.आणि पाऊल वाकडे पडणे म्हणजे मार्ग चुकणे. पाऊलवाट म्हणजे पायी चालता येईल अशी अरुंदवाट पुढील मार्ग दाखवणारी म्हणून संतांच्या पाऊलवाटेने आपण चालावे असे म्हणतात.बाळाचे पाय पाळण्यात दिसतात अशी आपल्याकडे एक म्हण आहे म्हणजे बाळाच्या पायांच्या हालचालीवरून पुढील त्याच्या कर्तुत्वाचा अंदाज येतो. मेंदिने रंगलेल्या पावलांनी नववधू घराचा उंबरठा ओलांडते तेव्हा पायाने तांदळाचे माप आज सांडते.लक्ष्मी रूपाने आलेली ही वधू घरातील लक्ष्मी घरातच ठेवते. नर्तकीचे नृत्यही तिच्या पायाणच्या हालचालीच्या तालावरच होत असते.वारकऱ्यांची पावले पंढरीचा मार्ग चालतात तेही विठ्ठलाच्या चरण स्पर्शाच्या ओढीने. स्वातंत्र्यवीरांच्या पावलावर पाऊल ठेवून सैनिक देशाचे रक्षण करतात. एव्हरेस्टवर उमटलेली आणि अंटार्टिकावर उमटलेली भारतीयांची पावले देखील आपली सत्ता दाखवणारी तर चंद्रावरील माणसाचे पावले चंद्रालाही गवसणी घालणारी.अशा प्रकारे पावलेही समृद्धीकडे नेणारी प्रगतीचा मार्ग दाखवणारी म्हणूनच म्हटले आहे.

एक एक पाऊल चालनिश्चयाने

नकोय बावरून जाऊ नियतीच्या भयाने.

©  सौ. शालिनी जोशी

संपर्क – फ्लेट न .3 .राधाप्रिया  टेरेसेस, समर्थपथ, प्रतिज्ञा मंगल कार्यालयाजवळ, कर्वेनगर, पुणे, 411052.

मोबाईल नं.—9850909383

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ एकविसाव्या शतकातील गुरु… + संपादकीय निवेदन – सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई – अभिनंदन ☆ सम्पादक मंडळ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

सूचना/Information

(साहित्यिक एवं सांस्कृतिक समाचार)

सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

🪻 अभिनंदन 🪻

इनरव्हील क्लब, डोंबिवली यांनी आयोजित केलेल्या निबंध स्पर्धेत आपल्या समुहातील ज्येष्ठ साहित्यिका सौ. पुष्पा प्रभूदेसाई यांना द्वितीय पुरस्कार प्राप्त झाला आहे. ई अभिव्यक्ती परिवारातर्फे त्यांचे मन:पूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा 💐

निबंधासाठी ‘ एकविसाव्या शतकातील गुरु ‘ असा विषय दिला होता. त्यांनी मोबाईलला गुरु मानून लेखन केले आहे.

आज त्यांचा हा निबंध “एकविसाव्या शतकातील गुरु…“, ‘विविधा ‘ या सदरात देत आहोत.

संपादक मंडळ

ई अभिव्यक्ती मराठी

?  विविधा ?

☆ पुरस्कृत लेख – एकविसाव्या शतकातील गुरु… ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई ☆

गुरुः ब्रम्हा, गुरुःविष्णु, गुरुःदेवो महेश्वराः

गुरुः साक्षात, परब्रम्ह, तस्मै श्री गुरवे नमः

हा श्लोक आपण लहानपणापासून सकाळी उठल्यानंतर म्हणतलो आहोत. अत्यंत महत्त्वाचा श्लोक आहे हा.

‘ गुरु ‘ या दोन अक्षरी शब्दाचा अर्थ असा आहे की, ‘ गु ‘म्हणजे अंधकार. आणि ‘ रू’ म्हणजे प्रकाश. जो आपल्या अज्ञानाचा अंधःकार दूर करून प्रकाश देतो तो गुरु. जो शिष्याचे आई-वडीलही होतो; मी पणा

बाजूला ठेवून निरपेक्षपणे ज्ञानाची गोडी लावतो; शिष्याला कठीण प्रसंगी मी तुझ्या पाठीशी आहे असं म्हणून आधार देतो, तो ‘गुरु. ‘

पूर्वी प्रत्येक ऋषींना विशिष्ट विषयाचे सखोल ज्ञान असे. ते शिष्यांना देत असत. वर्तुळातील व्यास ही रेषा परीघाच्या प्रत्येक बिंदूला स्पर्श करते. आणि विभाजनही करते. त्याप्रमाणे सृष्टीचक्राचे सर्वंकष उपयुक्त ज्ञान आणि अनुभव देणारे आद्य गुरु म्हणजे ‘व्यास’

आज काळ पालटलाय. मुलं शाळेत जातात. शिक्षक शिकवितात. चार पैसे मिळविण्यासाठी ज्ञान देणारे ते शिक्षक. हातचे न राखता, मनापासून आणि सर्वतोपरी शिष्याला ज्ञान देणारे ते ‘गुरु. ‘ जन्मदाते माता पिता हे तर गुरु असतातच. पण पुढे आयुष्यात ज्ञान मिळवून यशस्वी व्हायचे असेल तर आणखीही गुरु हवेत.

आज 21व्या शतकात विज्ञानाच्या कक्षा रुंदावत चालल्या आहेत. इतकं विस्तृत ज्ञान जर आत्मसात करायचं असेल तर वैज्ञानिक उपकरणांच्या गुरुचा आधार घ्यावा असं मला वाटतं. तुम्हाला मजा आणि कदाचित आश्चर्य वाटेल माझा गुरु ऐकून. प्रत्येक व्यक्तीला हवाहवासा वाटणारा, सर्वांचा लाडका, पावलोपावली गरज असणारा, हवं ते ज्ञान देणारा, एका हातात मावणारा, ‘ ”भ्रमणध्वनी’ किंवा ‘मोबाईल’ हा एकविसाव्या शतकातला माझा सच्चा ‘गुरु’.! त्याची महती किती सांगावी तितकी कमी. त्याच्या उपकाराची फेड करणं कठीणच आहे. मनात इच्छा झाली की, एक छोटेसे बटन दाबल्यासरशी मैत्रिणी, नातेवाईक सर्वांशी बोलता येते. अंतर कितीही असो, अगदी साता समुद्रापार असलेल्या व्यक्तीशी केवळ बोलणेच नाही, तर त्याला पाहता ही येते. केवढा आनंद मिळवून देतो ना हा गुरु! अगदीच वेळ नसेल तर केवळ मेसेजही दुसऱ्याला सांगण्याचे काम करतो. काही वेळा ज्येष्ठ नागरिकांना कंटाळा येतो. अशा वेळी हा ‘मोबाईल गुरु’ त्यांना सिनेमा दाखवू शकतो. गाणी ऐकवून त्यांची कर्मणूक करतो. त्यांचा मित्र बनतो जणू तो! आपल्याला परगावी जायचे असेल तर, अगदी घरात बसून रेल्वे, बस, विमानाचे आरक्षणही करून देतो. ठिकठिकाणची अंतरं सांगतो. आपल्या गाडीतून इच्छित ठिकाणी जाताना, कोणत्या मार्गाने जायचं, तो मार्गही दाखवत राहतो. मोबाईल गुरु शेतकऱ्यांवरही किती उपकार करतो ना? आपल्या भागात अगदी भारतातही पाऊस कुठे, किती, कधी पडेल याचा अंदाजही देतो. त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांचे काम सुलभ होते. बातम्या म्हणाल तर, लोकल ते ग्लोबल इतक्या या गुरू मोबाईल मुळे मिळू शकतात. आपल्याला हव्या असलेल्यांचे नंबर तो स्वतः जवळ साठवून ठेवतो. व हवे तेव्हा सांगतो. एखादा कार्यक्रम असेल तर हा गुरु फोटो काढून ते साठवून ठेवतो. आणि केवढा तरी आनंद मिळवून देतो ना! गणिताचा, हिशोबाचा ताळमेळ करायचा असेल तर तो काही सेकंदात बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, वर्गमूळ, घनमूळ, अनेक घात, क्षेत्रफळ सांगून आपल्याला चकित करून सोडतो. एखादा निबंध, एखाद्या व्यक्तीचे चरित्र लिहायचे असेल, एखाद्या शब्दाचा अर्थ हवा असेल किंवा तो शब्द इतर भाषांमध्ये कसा भाषांतरित होईल याची उत्तरे द्यायला हा गुरू क्षणात तयार असतो हो. किती वाजले याची वेळ सांगतो. इतकच नाही तर तारीख, वार अशी दिनदर्शिका ही थांब सांगतो तुला अस म्हणतो. गजर लावला की, ठराविक वेळेला बरोबर उठ म्हणतो. सर्वात महत्त्वाचं म्हणजे, आरोग्य. कोणीतरी क्लास घेत असेल तर घरी बसून ऑनलाइन धडे घेऊ शकतो. इतकच काय व्यायाम म्हणून जर चालायचे असेल तर, आपण किती अंतर चाललो याची मोजदाद ठेवून ती आपल्याला सांगतो हो हा गुरू मोबाईल. या मोबाईल गुरुंनी अगदी लहान बाळापासून ते ज्येष्ठांपर्यंत सगळ्यांनाच आपलंसं केलंय. बाळ रडायला लागलं, जेवत नाहीस झालं तर, गुरु गाणं सुरू करतो. आणि खरंच बाळ रडायचं थांबत. या गुरुचे अनेक ॲप्स वेगवेगळी कामे करतात. ज्ञान, मनोरंजन, माहिती या तीनही गोष्टी क्षणार्धात आपल्याला सांगण्याचे एक महान कार्य हा गुरु मोबाईल करतो. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (ए आय)च्या आगमनाने तर या मोबाईल गुरुला आणखीच मोठं बळ मिळालय. त्यामुळे विस्तारित (व्हास्ट)ज्ञान जर आत्मसात करायचं असेल तर अशा वैज्ञानिक उपकरणांच्या गुरुचा आधार घ्यायला काय हरकत आहे? ‘ संगणक ‘ हा मोबाईल गुरुचा मोठा बंधू गुरु. पण आमच्यासारख्या पंचाहत्तर च्या पुढे गेलेल्यांना तो कितपत पेलवेल? हा आपला छोटा, हातात राहणारा गुरु छान. आता तर मुलींच्या सुरक्षेसाठी जी. पी. एस. त्यांच्या दप्तरात ठेवून, त्यांचा कनेक्ट पालकांच्या मोबाईल गुरुशी जोडलेला असतो. कोणाला लेखन पाठवायचे तर, हा मोबाईल गुरु म्हणतो, ” तू मला सांग मी टाईप करून देतो. अगदी सुंदर अक्षरात बरं”या गुरुचे उपकार (सर्वांवरच) तर आहेतच पण तरीसुद्धा त्याच्याकडून ज्ञान मिळविताना, त्याला ऊर्जा (चार्जिंग)द्यावी लागते. ऊर्जा संपली की गुरु गप्प बसतो. ऊर्जा दिली तरी त्याला वेळच्यावेळी गुरुदक्षिणाही (रिचार्ज) द्यावी लागते बरं! . हे सगळं जरी खरं असलं तरी त्याच्या आहारी जाण्यात अतिरेक केला तर, लहान थोरही त्याच्या सापळ्यात अडकू शकतात. केवळ वेळ वाया जाणं हा एकच दुष्परिणाम नाही तर त्यामुळे मनोविकारही बळावत आहेत. झोपेवर परिणाम होऊन अवेळी भूक लागते. डोळ्यांना त्रास होतो. डिजिटल आय स्ट्रेनची लक्षणे दिसू लागतात.. विस्मरण व्हायला लागतं. शरीरातील ग्रंथी आणि मेंदूच्याक्षमतांवर परिणाम होतो. त्याच्या कार्यातील संदेश प्रणाली नीट काम करेनाशी होते. कमी हालचालींमुळे स्पर्शज्ञान व सजगता कमी होते. न्यूरोलॉजिकल आजार होऊ शकतात. स्क्रीनचा ब्ल्यू लाईट डोळ्यावर पडल्याने शारीरिक चक्र बिघडतं. आणि मग थकवा मरगळ यायला लागते. कोविड च्या काळात करमणूक करणारा मित्र म्हणून त्याच्या वापराचा अतिरेक झालाआणि मग नंतर घातक परिणाम दिसायला लागले. तसेच लहान मुलांच्या डोळ्यांच्या तक्रारीचे मोबाईलचा अतिवापर हे एक कारण आहे. मग यासाठी आपण काय करायला हवं आपणच आपल्यावर बंधन घालायला हवं दिवसा काठी काही ठराविक वेळच त्याला जवळ ठेवायचं. त्यालाही विश्रांती हवी ना? आपण झोपण्यापूर्वी दोन तास अगोदर टीव्ही संगणक मोबाईल यांनाही झोपू द्यायचं. झोपतानाही या मोबाईल गुरूला लांबच ठेवायचं. गुरु मधील ब्ल्यू कलर कमी केला की शरीरातील मेलाटोनिनची पातळी बिघडत नाही. या मोबाईल गुरुशी जर नियमबद्ध राहून ज्ञान घेतले तर त्याच्यासारखा गुरु दुसरा नाही. अगदी थोडक्यात त्याचे महती सांगायची तर असे म्हणता येईल

चैतन्य: शाश्वत: शान्तो व्योमातीतो निरंजन।

बिंदूनादकलातीतस्तस्मै श्री गुरवे नमः।।

अशा श्री गुरूंना माझा नमस्कार असो.

©  सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

बुधगावकर मळा रस्ता, मिरज.

मो. ९४०३५७०९८७

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ मानसुमने ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

? विविधा ?

☆ मानसुमने ☆ सौ राधिका भांडारकर

सोनियाच्या ताटी

उजळल्या ज्योती

ओवाळीते भाऊराया

वेड्या बहिणीची वेडी ही माया

या ओळी वातावरणातून कधीही लहरत आल्या की कान आणि मन तृप्त होतं. बहीण हा शब्द कधी एकट्याने येतच नसावा. अदृश्यपणे बहीण या शब्दाबरोबर भाऊ हा शब्द असतो आणि ज्या ज्या वेळी बहीणभाऊ असा जोडशब्द उच्चारला जातो तेव्हा नकळत त्या भोवती मायेची, प्रेमाची, भावबंधनाची झालर सहजपणे विणली जाते.

हिंदू संस्कृतीत बहीणभावाच्या या नात्याला अपरंपार महत्त्व आहे आणि हा ममतेचा रेशीमबंध सदैव जपला जावा म्हणूनच रक्षाबंधन, भाऊबीज यासारखे सण बहीणभावामधली प्रेमाची गाठ अतूट राहण्यासाठी साजरे केले जातात. परंपरा आणि संकेतात गुंतलेला हा भावनिक धागा अशा रीतीने जपला जातो.

अर्थात बहीणभावाचं सांस्कृतिक पातळीवरचं नातं असं असावं अशी सामाजिक अपेक्षा असते. प्रत्यक्षातले अनुभव कदाचित निराळे असू शकतात. मुळातच नाती टिकवणं, नाती जपणं, नात्यातला बंध पाळणं, नात्याला अधिक सुंदर करणं या गोष्टी आजच्या यंत्रयुगात मात्र काहीशा धूसर झालेल्या जाणवतात.

जगण्याच्या कल्पनाच बदलल्या आहेत का? की यांत्रिकतेत, कमालीच्या गतिमानतेत, स्पर्धेच्या युगात, स्वातंत्र्याच्या अफाट कल्पनेत, स्थळ काळानुसार कुठेतरी या संकेतांनाच नकळत पायदळी चिरडले जात आहे का?

एक हजारो मे मेरी बहना है

सारी उमर हमे संग रहना है।।

हे फक्त गाण्यापुरतंच उरलं आहे का?

पण या साऱ्या सांस्कृतिक पारंपरिक प्रश्नांची उत्तरे शोधण्यापूर्वी एक गमतीदार विचार मनात येतो तो सध्या राजकीय क्षेत्रात गाजत असलेल्या लाडकी बहीण या शब्द समूहामुळे. वास्तविक या लेखाला मला कुठलंही राजकारणी स्वरूप नक्कीच द्यायचं नाही अथवा राजकारणावर टीका करण्याचा माझा हेतूही नाही पण समाजात जगत असताना “जगणं आणि राजकारण” याची फारकत कशी करणार? शिवाय एका राजकीय पक्षाकडून लाडक्या बहिणीला मिळणारं हे अनुदान नक्की कशासाठी? हा प्रश्न दुर्लक्षित कसा काय करणार? “आवळा देऊन कोहळा” काढण्यासारखं नाही का वाटत हे? घ्या अनुदान करा मतदान अशी एक अंतस्थ घोषणा नाही का ऐकू येत? भेटीत दानाची भूमिका असेल पण या दानात बहिणीचा मान, सन्मान खरोखरच राखला आहे का आणि तसं असेलच तर मग पुढचा अत्यंत महत्त्वाचा आणि ज्वलंत प्रश्न निर्माण होतो तो महिलांच्या सुरक्षिततेविषयी.

प्रत्येक मिनिटाला तीन ते पाच बलात्कार होत असलेल्या आपल्या देशात लाडकी बहीण या शब्दरचनेला कुठला अर्थ प्राप्त होतो? पंधराशे रुपयाची भेट तिच्या खात्यात जमा करा आणि तिच्या स्त्रीत्वाचे, स्वाभिमानाचे, अस्तित्वाचे धिंडवडे पहात रहा.

परवाच मी माझी मदतनीस कविता हिला सहज विचारलं, “ का गं! तू लाडकी बहीण योजनेत तुझं नाव नोंदवलंस की नाही? ” तेव्हा तिने ताठ मानेने डोळे रोखून माझ्याकडे पाहिलं आणि ती म्हणाली, ” ताई मला दान नको मला मान हवा. “

घरोघरी ती काम करते, चार पैसे कमावते. मुलाच्या शिक्षणाचे स्वप्न पाहते आणि दारुड्या नवऱ्याचा रोज मार खाते. रस्त्यातून चालत येताना तिला असंख्य विकारी नजरा झेलाव्या लागतात तेव्हा कुठे जातो हा लाडक्या बहिणीचा भाऊ आणि त्याच्या मनगटावर असंख्य भगिनींनी रक्षाबंधनाच्या दिवशी बांधलेले ते धागे?

ओवाळणीच्या ताटात दिलेल्या भाऊबीजेतून बहिणीला हवा असतो विश्वास. भेटीत केवळ काहीतरी दिल्याचा भाव नको. राखला जावा तिचा मान, जपली जावी तिची सक्षमता, तिचा जगण्याचा अधिकार, तिची आत्मनिर्भरता.

महिला सक्षमतेच्या विविध कायद्यांची अंमलबजावणी आणि कायद्याचे ज्ञानदान तिला मिळावे. वडिलोपार्जित मालमत्तेतला तिचा हक्क तिला सन्मानाने मिळावा. तिच्या स्त्रीधनाची बूज राखली जावी. एका ओवाळणीने तिला लाचार किंवा उपकृत करुन एक प्रकारच्या अदृश्य दास्यात बांधण्यापेक्षा तिच्यासाठी सन्मानाची दालनं खुली करून द्या.. जिथे नसतील हिंसा, मानहानी, निर्भत्सना, अत्याचार, तिच्या देहाची केलेली लक्तरे, तिच्या जन्माची झालेली हेळसांड. तिथे फक्त असावी मानाच्या सुमनांची शुद्ध मोकळी उधळण.

अपेक्षा ही आहे नुसत्या दानाची नव्हे तर सन्मानाची.

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

मो.९४२१५२३६६९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ ‘कुणाच्या खाद्यावरी संस्कारांचे ओझे’ ☆ श्री दिवाकर बुरसे ☆

श्री दिवाकर बुरसे

🌸 विविधा 🌸

☆ ‘कुणाच्या खाद्यावरी संस्कारांचे ओझे’ ☆ श्री दिवाकर बुरसे

पालकांनी लहानपणापासूनच आपल्या पाल्यांवर उत्तम संस्कार करून त्यांना कर्तृत्ववान, सुशिक्षित, सज्जन, शक्तिशाली आदर्श नागरिक करावे – असे नागरिक जे समाजात, व्यवसायात, आपापल्या कार्यक्षेत्रात उत्तम योगदान देऊ शकतील. कुटुंबाचा, गावचा, देशाचा लौकिक वाढतील. आपल्या मुलांवर सुसंस्कार करण्यात निःसंशय पालकांचे व नंतर शाळेचे दायित्व सर्वाधिक असते.

तत्वतः हे मान्यच आहे की पालकांनी मुलांवर घरातच उत्तम संस्कार करावेत. शाळेने सुद्धा मुलांवर उत्तम संस्कार करावेत. त्यातून जर एखादे मूल बिघडले तर त्याला पालक व शाळा जबाबदार आहेत असे सहज म्हणून आपण मोकळे होतो. आपल्या या म्हणण्यात कितपत तथ्य आहे हे कधी आपण तपासलं आहे का हो?

मूल मुळात घरी आपल्या आई-वडील-आजी-आजोबा-भावंडे (सध्या घरात आजी- आजोबा, भावंडे असणे तसे दुर्मिळच झाले आहे) यांच्या सहवासात खरंच किती वयापर्यंत आणि किती वेळ असते? घराबाहेर किती वेळ असते? मुलावर संस्कार केवळ घरातूनच होतात की बाहेरील जगाकडून? त्यावर घरच्यांचे संस्कार अधिक होतात की घराबाहेरच्या समाजाचे?

घरात आजोबा-आजी बाळाची मनापासून काळजी घेतात. त्याच्याशी त्याच्या वयाचं होऊन खेळतात, काऊ-चिऊच्या, साळू-ससुल्याच्या, भीमा-बलभीमाच्या, राम-कृष्णाच्या गोष्टी सांगत घास भरवतात, आंगाई गाऊन निजवतात. असे भाग्य काहींच्याच वाट्याला येते. आजी-आजोबांच्या सुखद सहवाच्या स्मृतींची शिदोरी बालकाला जन्मभर पुरते.

घरात कोणी जेष्ठ व्यक्ती नसतील आणि आई-वडील नोकरी-व्यवसायासाठी घराबाहेर जाणारे असतील तर त्या ३-४-५ महिन्यापासूनच बाळाला पाळणाघरात रहावे लागते. सकाळपासून संध्याकाळपर्यंत ते लेकरू पाळणाघराच्या संचालिकेच्या ताब्यात असते. तिथे बाळाच्या घरचे, मायेचे, परिचयाचे असे कोsणी नसते.

ती संचालिका सुसंस्कृत सुशिक्षित असल्यास उत्तम पण त्या सहसा तशा नसतात आणि प्रशिक्षित तर नक्कीच नसतात. आपल्या कुटुंबाला आर्थिक हातभार लागावा म्हणून त्या हा व्यवसाय पत्करतात येवढेच. समाजालाही या सेवेची गरज असते. संचालिकेकडे वेगवेगळ्या कुटुंबातील, वेगवेगळ्या संस्कृतीत जन्माला आलेली, भिन्न भिन्न आर्थिक स्थिती असलेली, अनेक प्रदेशातून आलेली, बहुभाषी अशी १०-१२ मुले तरी येतात. त्यांचा वयोगट कदाचित वय पाच-सहा महिने ते आठ-दहा वर्षेही असू शकतो.
लहान बालकाला ६ महिन्यापासून घरच्यांपेक्षा अधिक काळ त्या संचालिकेच्या आणि वैविध्य असलेल्या लोकांच्या सहवासात रहावे लागते. ते मूल त्यांचे बोलणे, चालणे, वागणे, वेषभूषा पहात पहात मोठे होत असते. तिथेच त्याचा अनुभवसंग्रह, स्मृतिसंग्रह, दृष्यसंग्रह व शब्दसंग्रह विकसित होत असतो. इतरांच्या डब्यातल्या पदार्थांच्या विविध चवी चाखत ते वाढत असते. अशा पाळणाघरात मुलावर घरच्यासारखे संस्कार कसे व्हावेत? संस्कार होतात ते समाजातील विविध व्यक्तींचे, लोकांचे, घटनांचे आणि संचालिकेचे.

पाळणाघरातले मूल असो की घरी कुणाच्या निगराणीत वाढलेले असो, वयाच्या दोन-तीन वर्षापासून त्याच्या शालेय शिक्षण व जीवन प्रवासास आरंभ होतो. प्ले ग्रुप, ज्युनियर के जी, सिनियर के जी, पहिली, दुसरी, तिसरी, चौथी……!
बाळ वाढत असते. त्याला घरून न्यायला आणि परत घरी सोडायला रिक्षा किंवा स्कूल व्हँन किंवा स्कूल बस येते. या वाहनातून जाता-येतानाच्या रोजच्या प्रवासात एक नवीन पात्र त्याच्या आयुष्यात येते, ते म्हणजे रिक्षावाले किंवा व्हँनवाले काका. त्यांचे बोलणे, वागणे, सूचना देणे, त्यांच्या सवयी, असतील तर व्यसने ते मूल बारकाईने पहाते.

हे बाळ आता घराबाहेरील समाजात मिसळत असते, प्रवासात विविध शब्द, स्वर, चित्रे, बोली, विविध पोषाखातील माणसे, स्त्री-पुरुष, मुले-मुली, सजवलेली दुकाने, माँल्स, डिपार्टमेंटल स्टोअर्स, राजकीय पक्षांची अवाढव्य बँनर्स, कटाऊटस्, भडक आकर्षक, उन्मत्त जाहिराती, रस्त्यावरील वाहने, गर्दी, आपघात, बाचाबाची, भांडणे, सिग्नलपाशी होणारी पुढे जाणाऱ्यांची धडपड इ. ते विस्फारलेल्या नेत्रांनी पहात राहते. हे गतिमान विश्व नुकतेच घराबाहेर पडलेल्या बालकाला विस्मयकारक, कदाचित अंगावर आल्यासारखे भयावह वाटते. त्यातून तो टिपकागदाप्रमाणे अनेक संस्कार मनात साठवत असतो, त्यांचे अर्थ लावीत असतो. त्यातले काही प्रसंग त्याला रिझवतात, हवेहवेशे वाटतात तर काही नकोसे वाटतात. बालक हे सारे संस्कार घरातून नाही, समाजाकडून घेत असतो. त्याच्यावर होणारे संस्कार समाजाकडून घडत आसतात.
शाळेतून घरी आल्यावर त्याला हायसे वाटते. आई – बाबाही दमूनभागून घरी येतात. जुजबी बोलणे होते. जरा विसावल्यावर बाबा टीव्ही लावतो. ती बातम्यांची वेळ असते. वार्ताहार कडकडत बातम्या सांगत असतो. अमक्याने तोफ डागली, तमक्याने पलटवार केला, ढमक्याला अटक केली इ. इ. दुसरा चँनेल लावला तरी तिथेही तेच चालू असते. मग बाळाची आई एखादी मराठी सिरियल लावते. त्यात दोन बाया एक तर भांडत असतात, एकमेकांवर काही खुनशी कुरघोड्या करीत असतात किंवा टोमणे मारताना दिसतात. आई पुन्हा चँनेल बदलते. कुठे तरी सिनेमा, कुठे बेछुट गोळिबार, कुठे प्रणय तर कुठे राजकीय चर्चा. असं कुठे काही अन् कुठे काही चालू असतं. एकमागे एक चँनेल्स बदलत असलेले पाहून बाळ गोंधळून जाते. कशाचा कशाला मेळ नसतो. टीव्हीवर चालू असतो, बाळाला दिसत असतो आणि त्याच्या इवल्याश्या डोक्यात उडालेला असतो केवळ ताणयुक्त गोंधळ!

शेवटी टीव्ही बंद करून आई बाळाच्या जवळ बसते. दिवसभरचा वृत्तांत विचारते. थोड्या गप्पा गोष्टी, हास्यविनोद होतात. बाबा मोबाईलवर कुणाशी बोलत असतो. बाळाला भूक लागल्याचे तिच्या लक्षात येते. ती त्याला जेऊ घालते. बाळ थोड्याच वेळात झोपी जाते. बालकाला आई-वडिलांचा सहवास आणि त्यांच्याकडून होणाऱ्या संस्कारांना अशा मर्यादा असतात.

असे दिवस जात असतात. बाळ वाढत असते. सातवी-आठवीतले बाळ आता मित्रांबरोबर सायकलने शाळेत जा-ये करू लागते. त्याच्या जीवनातील एक नवा थरार ते अनुभवू लागते. शाळेनंतर ट्यूशन, नंतर एखादा कोचिंग क्लास, असा दिनक्रम सुरू होतो. आईबाबापाशी बसून बोलायलाही वेळ नसतो त्याला. इथे कसे आणि कसले होणार घरचे संस्कार!

बाळ मोठा होतो. काँलेजला जाण्यासाठी त्याला कौतुकाने मोटरबाईक घेऊन दिली जाते. वर खर्चासाठी बाळाला दरमहा पाँकेट मनी मिळू लागतो, बरोबरच्या इतर मित्रांनाही अशी पाँकेटमनी त्यांचे पालक देत असतात. बाळ खूष असतो!

नवे मित्र-मैत्रिणी, नवे सवंगडी, नवे छंद, सुरु होतात. काँलेजच्या निवडणुका, गँदरिंग्ज, ट्रिपा, पिकनिक्स, कुणाच्या बर्थडे पार्ट्या, फ्रेंडशिप डे, व्हँलेंटाईन डे, यात वर्षे कापरासारखी उडून जातात. बाहेरच्या जगातली अनेक प्रलोभने त्याला आकर्षित करीत असतात. युवावस्था प्राप्त झालेला बाळ आता घरी कमी बाहेर समाजात अधिक काळ आसतो. घरी वेळी अवेळी, रात्री-अपरात्री येऊ लागतो. विचारले तर आई-बाबाला उडवाउडवीची उत्तरे मिळतात. मुलाची पावले वाकड्या वाटेवर पडू लागतात. बाळ भरकटू लागतो. नको त्या वयात नको ते करू लागतो. परीक्षेत नापास होतो. एखाद्या मुलीच्या प्रेमात किंवा व्यसनात अडकतो. बघता बघता पोर अखेर वाया जाते. पालकांना हा मोठा धक्का असतो. लोक म्हणतात आईबापाने मुलावर नीट लक्ष दिले नाही, संस्कार केले नाहीत तर मग दुसरं काय होणार!

हे एक प्रातिनिधिक उदाहरण झाले. तपशीलात फरक असेल पण साधारणपणे मूल बिघडण्याचा घटनाक्रम हा असाच असतो.
अशी भरकटलेली अनेक मुले-मुली घरोघर दिसतील. त्या साऱ्यांचे पालक खरंच त्याच्या भरकटण्याला, अधःपतनाला उत्तरदायी आहेत का हो? कुठल्या पालकांना वाटते की आपले मूल वाया जावे, गुंड, मवाली, व्यसनी व्हावे! तरीही अशी पिढी घडतेय, असा समाज निर्माण होतोय हे वास्तव आहे. निरुपयोगी, उपद्रवी, उनाड, अवैध व्यवसाय करणारी, व्यसनी, मादक पदार्थ सेवन करणारी, त्यांची खरेदी-विक्री विकणारी, अनैतिक व्यवहार करणारी, दंगेधोपे घडवणारी, तरूण मुले समाजात वाढत आहेत.

हे असले नको ते उद्योग मुले का करतात? कुठे शिकतात? घरी की समाजात? यावर गंभीर चिंतन व्हायला हवे. शीघ्रगतीने प्रतिबंधात्मक उपाययोजना करायला हव्यात. शासनाच्यावर हे प्रश्न सोडून आपण हतबल होऊन बसू शकत नाही, यातून सुटू शकत नाही. नागरिक म्हणून आपलीही काही कर्तव्ये आहेत हे आपल्याला विसरून चालणार नाही.

परवा मी दुपारी तीनच्या सुमारास आमच्या सोसायटीच्या लिफ्टमधून बाहेर पडलो. पार्किंगमधे पाच-सहा अलिशान गाड्या उभ्या होत्या. त्यातल्या जरा बाजूला पार्क केलेल्या एका कारकडे माझे सहज लक्ष गेले. कारमधे दोन-तीन शाळकरी (१०-१२ वी तली) मुले कारचे दार बंद करून आत बसून तन्मयतेने मोबाईलवर काही बघत बसली होती. माझ्याकडे त्यांचे लक्ष नव्हते. आतून कारचा ए सी चालू होता.

कुतुहल म्हणून मी वाट वाकडी करून कारपाशी गेलो. मुलांचे माझ्या येण्याकडे लक्ष नव्हतेच. मी हातातल्या किल्लीने कारच्या काचेवर टकटक केले. चपापून मोबाईलधारक मुलाने हातातला मोबाईल बंद केला आणि चमकून माझ्याकडे पाहिले. मी त्याला कारचे दार उघडायला खुणावले. दार उघडून तिघेही कारबाहेर आले. माझ्या अचानक येण्याने ते जरा घाबरलेलेच दिसले. मी चौकशी केली. तर त्यातला एक मुलगा सोसायटीत राहणारा आणि इतर दोन दुसरीकडे राहणारे त्याचे वर्गमित्र होते. चौकशीत समजले की ते आज शाळत न जाता घरीच थांबले आहेत. त्याचे पालक आँफीसला गेले होते. त्यांची कार सर्व्हिसिंगला द्यायची होती. मेकँनिक घरी येऊन कार नेऊन सर्व्हिसिंग करून परत आणून देणार होता. म्हणूनच कारची किल्ली घरी मुलाजवळ दिली होती. मुलाने या संधीचा फायदा उठवून मित्रांबरोबर ए सी कारमधे बसून पिक्चर पहायचा घाट घातला होता.

मी त्यांना जरा समजावले. वाँचमनला बोलावून त्याच्या समोरच त्यांना त्वरित घरी जायला सांगितले. मुले चडफडत तिथून निघून गेली. मी वाँचमनलाही समज दिली आणि आजची घटना मुलाच्या पालकाच्या कानावर घालायला सांगितली. पुढे काय झाले मला समजले नाही. कारण काय घडले हे सांगायला ना वाँचमन माझ्याकडे आला ना मुलाचे पालक आले. विषय तिथेच थांभला. मी हे योग्य केले की अयोग्य हे आपण ठरवा पण मी जेष्ठ नागरिकाचे माझे कर्तव्य केले होते असे मला तरी वाटते!

माझ्या लहानपणी पुण्यात शाळेच्या वेळात एखादे मूल चित्रपट गृहात चित्रपट पाहण्यासाठी आलेले दिसल्यास चित्रपटगृहाचे व्यवस्थापक स्वतः जातीने त्याची चौकशी करीत. त्याचे नाव, शाळा, इयत्ता विचारीत. काही संशयास्पद आढळल्यास त्याच्या शाळेच्या मुख्याध्यापकांशी संपर्क करून त्यांना ही माहिती देत. शाळातून आलेल्या शिपायाच्या ताब्यात त्या मुलाला सुपूर्त करेपर्यंत त्याला स्वतः कार्यालयात, स्वतःच्या निगराणीखाली ठेवीत. सध्या असे कोणी दक्षतेने वागताना दिसते का आपल्याला? हाँटेलमधे मुलं आली तर त्यांना सेवा मिळे पण बिलाचे पैसे देताना काऊंटरवरचा मालक त्या मुलांची अवश्य चौकशी करीत. पैसे कुणी दिले, कुठून आणले असे प्रश्न विचारले जात. त्याला काही संशयास्पद वाटले तर तो वाट वाकडी करून ही गोष्ट मुलांच्या पालक-शिक्षकांच्या कानावर अवश्य घाली. गारुड्याचा खेळ पहाणाऱ्या मुलांना तिथला एखादा नागरिक अवश्य विचारी, ‘काय रे बाळांनो, शाळेत जायला निघालात ना? मग इथं का टाईमपास करताय. पळा, निघा, शाळेत जा’.

आमच्या गल्लीत रिकामटेकडी मुले रस्त्यावर वेळी-अवेळी भोवरे, पतंग, सिगरेटची रिकामी चपटी केलेली पाकिटं, गोट्या, लगोऱ्या इ खेळ खेळत खेळत वेळ घालवीत, उडाणटप्पूपणा करीत फिरत. दिवसभर त्यांना आवरणारं कोणी नसायचं. ‘बांदल’ नावाचा एका माणसाला मात्र ती मुले जाम टरकायची. ‘बांदल आला’ असं कुणी म्हटलं तरी पोरं खेळ सोडून धूम ठोकायची. येता-जाता उनाड, भटकणाऱ्या मुलांना, तो आवर्जून हटकायचा. त्यांची चौकशी करायचा. वेळप्रसंगी त्यांना तंबी द्यायचा. बुधवार चौक, प्रभात टाँकीज, दक्षिणमुखी मारूती, शनिवारातला मनपाचा दवाखाना, नवापूल, घारपुरे हाँस्पिटल (आताचे सूर्या)सात तोटी चौक, कसबा गणपती, जिजामाता बाग हे त्याचे कार्यक्षेत्र होते. या भागातील मुलांवर बांदलचं बारीक लक्ष असायचं. मुलांचे पालकही कधी त्या बांदलशी भांडायला आल्याचे पाहण्यात नाही. असा एखादा जागरुक बांदल आता कुठे दिसतो का तुम्हाला? परिसरात सोडा, आपल्या सोसायटीमधे तरी अशी एखादी व्यक्ती आपल्याला दिसते का? ‘बांदल’ नावाचा हा पायजमा शर्टातला अतिसामान्य माणूस हे काम सामाजिक जाणिवेतून, एक जागरूक नागरिक म्हणून स्वयंस्फूर्तीने करीत होता.

पुस्तके, वह्या, वर्तमानपत्रे यांची रद्दी विकायला एखादा विद्यार्थी रद्दीच्या दुकानात आला तर तो रद्दीवाला सुद्धा त्याची सखोल चौकशी करून, योग्य वाटले तर त्याने आणलेली रद्दी खरेदी करीत असे. त्यालाही मुलांची काळजी वाटत असे. असे गावातले सामान्य पण जागरुक नागरिक मुलांवर उच्च संस्कार करीत असत. आता कुणीच कुणाला विचारी नाही. एकेकाळी प्रामाणिकपणाचे संस्कार समाजाकडून मुलांना मिळत, पालकांना न विचारता, सांगता समाजातील जागरुक नागरिक हे सहज करीत. ही सामाजिक व्यवस्था मुलांची काळजी घेई.

थोडक्यात काय तर सध्याच्या या अधुनिक गतिमान जगात मुले घरी कमी वेळ असतात. घरच्या तुलनेत समाजात अधिक वावरत असतात, वाढत असतात, समाजाकडूनच घडत असतात, संस्कारित होत आसतात.

म्हणून मुलांवर उत्तम संस्कार करण्याचे दायित्व केवळ त्याच्या पालकांचे किंवा शाळेतील शिक्षकांचे आहे असे म्हणून समाजाने त्रयस्थपणे, तटस्थपणे गंम्मत पहात बसू नये. आपल्या जबाबदाऱ्या ओळखून आपल्या वर्तणुकीतून आपल्या आजूबाजूला वावरणाऱ्या मुलांवर सुसंस्कार करावेत. ‘मी आणि माझा परिवार’ ही संकुचित वृत्ती सोडून गावातली मुलंही आपली आहेत या भावनेने त्यांच्याशी वागावे.

इथे मला, आँर्थर मिलर’ याचे एक नाटक आठवते. नाटकाचे नाव आहे, ‘आँल माय सन्स’. त्या नाटकात लेखकाने हाच संदेश दिलाय. जगातली सर्व बालके ही माझीच मुले आहेत असे समजून जेष्ठांनी स्वार्थ दूर सारून त्यांच्या हिताचा विचार करावा. आपल्या व्यवहारातून, वागण्यातून, त्यांच्यावर सुसंस्कार करावेत.

विचार करा आणि ठरवा की मुलांवर सुसंस्कार करणे ही केवळ पालकांची व शाळांची जबाबदारी आहे की समाज म्हणून आपलीही आहे. एखाद्याचे मूल पालकांच्या दुर्लक्षामुळे बिघडले की समाज म्हणून आपणही त्याच्याकडे दुर्लक्ष केले म्हणून बिघडले? मुले घडवण्यात केवळ शिक्षक, पालक कमी पडतायत की आपण, आपला सारा समाजच कमी पडतोय?

ही वेळ समाजातील प्रत्येक घटकाने कठोर आत्मपरीक्षण करण्याची आहे. भावी पिढी चारित्र्यवान, कर्तृत्ववान, गुणसंपन्न व्हावी असे वाटत असेल तर प्रत्येकाने प्रत्येक मुलांचे पालकत्व स्वयं स्वीकारून त्याच्यावर घरी-दारी, शाळेत-समाजात, जिथे संबंध येईल तिथे उत्तम संस्कार होतील असे बघावे, स्वतः तसे वागावे.

त्यासठी प्रथम आपण स्वतः सुसंस्कृत व्हावे. प्रत्येक व्यवहारात जबाबदारीने वागावे. आपल्या वर्तनातून आणि कृतीतून पुढील पिढ्यांसमोर आदर्श नागरिकत्वाचे दर्शन घडवावे. लक्षात ठेवा, मुले सदैव जेष्ठांचेच अनुकरण करत घडत असतात, वाढत असतात. त्यांचे यशापयश हे समाज म्हणून आपलेच यशापयश आहे असे मला ठामपणे म्हणावेसे वाटते!

सारांश, सुसंस्कृत मुले घडविण्यात पालकांचा व शाळांचा वाटा महत्वाचा असला तरी समाजाचा अधिक मोठा वाटा असतो. जसा समाज तशीच त्याची पुढची पिढी निपजते.

© श्री दिवाकर बुरसे

पुणे

संपर्कः ९२८४३००१२५, ९५५२६२९२४५

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ तो आणि मी…! – भाग ६९ ☆ श्री अरविंद लिमये ☆

श्री अरविंद लिमये

? विविधा ?

☆ तो आणि मी…! – भाग ६९ ☆ श्री अरविंद लिमये ☆

(पूर्वसूत्र- परतीच्या प्रवासात माझ्या मनात प्रमोशन मिळेल कीं नाही हा विचार नव्हताच. गेले चार महिने आपण घेतलेल्या अविरत कष्टाचं, आपल्या अथक प्रामाणिकपणे केलेल्या कामाचं, यानिमित्ताने थेट रिपोर्टिंग सेंट्रल ऑफिसला झाल्याचं समाधानच माझ्या मनाला उभारी देत राहिलं. अनपेक्षितपणे घडलेल्या या सगळ्या घटनाक्रमांमागे ‘तो’च होता याची पुढे लगेचच आलेली *प्रचीति ‘देता घेशील किती दो कराने’ अशी भावना माझ्या मनात आपसूकच निर्माण व्हावी अशीच होती!! )

आणि हे सगळं घडलं ते अकल्पित असा सुखद धक्का बसावा तसं. त्या सगळ्याच घटना इतक्या एकामागोमाग एक घडत गेल्या होत्या आणि त्या घटनाक्रमांमधल्या धाग्यांची वीणही इतकी घट्ट होती कीं प्रत्येक क्षणी हे खरंच घडतंय कां अशी शंका मनाला चाटून जायची इतकं ते अकल्पित होतं! ‘हे एखादं स्वप्न तर नसेल..? या सुखस्वप्नातून अचानक कोणत्याही क्षणी जाग येईल आणि पुन्हा तेच चटके देणारं हे वास्तव… ‘ अशा विचारांशी मी चाचपडत रहायचो. ते सगळं आठवलं की आजही मी आश्चर्याने थक्क होतो आणि त्यात लपलेल्या ‘त्या’च्या कृपालोभाच्या जाणीवेने पूर्णत: निश्चिंतही..!

माझ्या उत्कर्षाच्या वाटेवरचं या इंटरव्ह्यूच्या निमित्ताने समोर आलेलं हे वळण माझ्यासाठी कांहीसं संभ्रमात टाकणारंच होतं. इकडं आड न् तिकडं विहीर अशीच अवस्था. प्रमोशन म्हणजे पुन्हा बदली आलीच. एक्झिक्युटिव्ह पोस्ट म्हणजे जवळपास बदली होण्याची शक्यता जवळजवळ नाहीच. शिवाय कुठं, कशी होणार हे पुढं ऐनवेळी ठरणाऱ्या सेंट्रल आॅफिसच्या पाॅलिसीवर अवलंबून. इंटरव्ह्यूचे निकाल अगदी आज, उद्या असे कधीही येऊ शकणार होते. अगदी कोणत्याही क्षणी. रोज घरून बॅंकेत जाताना तिथं काय वाढून ठेवलं असेल हाच विचार मनात दबा धरून बसलेला असे.

माझ्या बाबतीतली अनिश्चितता तर इतरांच्या तुलनेत अधिकच काटेरी होती. कारण माझं आधीचं अहमदनगरचं फार तर वर्षभराचं आणि नंतर अचानक स्विकारावं लागलेलं हे चार महिन्यांपासूनचं अकोल्याचं वास्तव्य! या दोन्ही ब्रॅंचेसमधली आधीपासूनच साठून राहिलेली पेंडिंग कामं आणि तिथले मी चार्ज घेण्यापूर्वीच आलेले अॅडव्हर्स आॅडिट रिपोर्टस् हे माझ्यासाठी जड झालेल्या ओझ्याइतकेच पुढे मला अडसर ठरु शकणारे फार मोठे अडथळेही ठरणार होते! कारण नेमके त्याचवेळी आमचे नवीन डी. जी. एम्. (झोनल हेड) परप्रांतातून ट्रान्स्फर होऊन नुकतेच पुण्याच्या झोनल आॅफिसमधे रिपोर्ट झाले होते. या दोन्ही ब्रॅंचेसमधल्या निगेटीव्ह मॅटर्सना मी जबाबदार नसूनही माझ्या, शिवाय माझ्यासारख्या या झोनमधल्या इतरांच्या बाबतीतही त्यांचा अॅप्रोच सरधोपट, पूर्वग्रहदूषित आणि टोकाचा नकारात्मकच असायचा. ब्रॅंच मॅनेजर म्हणून याची झळ कांहीही चूक नसताना मलाच सहन करायला लागायची. त्यामुळे त्यांच्याकडून कसल्या सहकार्याची, प्रोत्साहनाची, कौतुकाची अपेक्षाच नव्हती. शिवाय एक दिवसाआड फाॅलोअपच्या निमित्ताने येणारा त्यांचा प्रत्येक फोन मला फटकारणाराच असायचा. तोवर आजपर्यंत सर्वांकडून मिळणाऱ्या कौतुक आणि प्रोत्साहनामुळेच मी यशाच्या पायऱ्या अतिशय सक्षमतेने भराभर चढत आलो होतो. मात्र यानंतरचं आपलं मार्गक्रमण मात्र अतिशय बिकट वाटेवरच्या खाचखळग्यातून वाट काढतच करावं लागणाराय आणि त्याची मानसिक तयारी करण्याशिवाय पर्यायही नाही हे मी गृहितच धरलं होतं. तरीही या नवीन आलेल्या डीजीएम् साहेबांची असमर्थनीय नाराजी आणि राग यांचे चटके इतर ब्रॅंचमॅनेजर्सच्या तुलनेत या दोन्ही ब्रॅंचेसमुळे मलाच अधिक बसायचे. ब्रॅंचमॅनेजर्सच्या पहिल्याच मिटींगमधे तर सेंट्रल आॅफिसकडून येणाऱ्या सततच्या तगाद्यांमुळे ते आम्हा सर्वांवर प्रचंड संतापले होते. त्या रागाच्या भरात माझ्यासकट अनेकांना..

“नाऊ यू फरगेट फ्यूचर प्रमोशन्स. आय वील टीच यू अ लेसन माईंड वेल. युवर अॅप्रेझल रिपोर्टस् आर इन माय हॅ़ंडस्.. ” ही त्यांनी केलेली दमदाटी कांहीही कारण नसताना सरसकट फर्मावलेली जबरदस्त शिक्षाच ठरणार होती आमच्यासाठी! नागपूर रिजनमधली ही अकोला ब्रॅंचही त्यांच्या पुणे झोनच्या अखत्यारीतच येत असल्याने माझी त्यांच्या तावडीतून सुटका नव्हतीच. कारण माझे अप्रेझल रिपोर्टही त्यांच्याच हातात असणार होते!

या सगळ्याच नकारात्मक पार्श्वभूमीवरचा नुकताच झालेला माझा तो एक्झिक्यूटिव्ह पोस्टचा इंटरव्ह्यू! निदान यावेळीतरी प्रमोशनच्या शक्यतेवर डीजीएम् साहेबांकडून गेलेल्या माझ्या अॅप्रेझल रिपोर्टमधल्या कमी स्कोअरिंगच्या शक्यतेचं सावट मला जाणवत होतंच. अशा परिस्थितीतही प्रमोशन मिळालंच तर कमी स्कोअरींगमुळे माझी आउट आॅफ स्टेट पोस्टींगची दाट शक्यता आणि नाही मिळालं तर अकोला ब्रॅंचला अजून किमान अडीच वर्षे असंच खिचपत पडणं! हे किंवा ते मला दोन्हीही नको होतं. त्यामुळे रोज ब्रॅंचमधे पाऊल ठेवताना आज पुढं काय वाढून ठेवलंय हीच भीतिने काळवंडलेली उत्सुकता मनात असायची. इंटरव्ह्यू देऊन आल्यापासून अशा मन:स्थितीत चारपाच दिवसच गेले असतील. कारण त्याच आठवड्यांत अचानक हातात पडला सेंट्रल आॅफीसमधल्या स्टाफ डिपार्टमेंटकडून माझ्या वैयक्तिक नावावर आलेला एक बंद लिफाफा!

त्या लिफाफ्यात माझं भविष्य बंदिस्त होतं! याआधी सविस्तर उल्लेख केलेल्या सर्व पार्श्वभूमीमुळे जास्तीत जास्त नकारात्मकच सगळं गृहीत धरलेल्या माझ्या मनात या बंद पाकीटात काय असेल याबद्दलची भीती नव्हती तशीच उत्सुकताही नव्हती. ती वेळच अशी होती कीं जे घडेल ते कितीही गैरसोयीचं असलं तरी स्विकारण्यावाचून दुसरा पर्यायच नव्हता‌. समोरची अनिश्चितता संपवण्यासाठी तो लिफाफा उघडून बघणं एवढंच माझ्या हातात होतं! तोपर्यंत असा क्षण मी कधीच अनुभवला नव्हता. सगळं उध्वस्तही होऊ शकेल हे गृहित असूनही कसा कुणास ठाऊक पण मनात भीतिचा लवलेशही नव्हता. शिक्षाच होणार असेल तर ती मी न केलेल्या चुकीचीच जर असणाराय तर त्यातही मला सुखरुप सांभाळणारा ‘तो’ आहेच कीं! आणखी काय हवं? मी शांतपणे लिफाफा ओपन केला. आतलं पत्र झरझर वाचताना अनपेक्षित अशा सुखद धक्क्याने मी अक्षरश: अंतर्बाह्य शहारलो होतो! त्या गोठून गेलेल्या मन:स्थितीत त्यातला शब्द न् शब्द हा एक चमत्कारच होता माझ्यासाठी! होय. मला प्रमोशन मिळालं होतं आणि आॅल इंडिया पातळीवर निवड झालेल्या एक हजार जणांच्या मेरीट-लिस्टमधे मी पहिल्या शंभरात होतो!! त्यामुळे अर्थातच होणारं पोस्टींग परराज्यात होणार नव्हतं. याही पेक्षा आश्चर्य हे कीं पुढे दोनच दिवसांनी माझी पोस्टींग-ऑर्डरही आलीच. त्यानुसार चीफ मॅनेजर म्हणून मला तात्काळ झोनल आॅफीस, पुण्याला जाॅईन व्हायचं होतं!

‘त्या’ने उदार अंत:करणाने मला असं भरभरून दिलं होतं आणि नेमक्या शब्दात सांगायचं तर ‘ देता घेशील किती दो कराने.. ‘ अशीच माझी अवस्था झाली होती! पण या अत्युत्तम सुखातही एक अनामिक अशी रुखरुख रेंगाळत होतीच. त्यामुळे इतकं सगळं अनपेक्षित घडलेलं असूनही, क्षणार्धात सुरू झालेल्या अभिनंदनाच्या वर्षावातही मी मात्र आतून कोरडाच होतो! कां ते माझं मलाच समजत नव्हतं. गेल्या चारपाच महिन्यात एकदाही सांगलीला घरी जाऊ न शकलेला मी आता पुण्याला म्हणजे घरापासून हाकेच्या अंतरावरच तर जाणार होतो, अकोल्यातून माझी मला हवी तशी कायमची आणि तीही अशी सन्मानाने सुटका होणार होती, आणि तरीही मनाला आनंद नव्हताच झाला. कां ते मलाच समजत नव्हतं आणि म्हणून मी मात्र सगळं मनासारखं घडूनही असं कां होतंय या विचारात अस्वस्थ!

त्या अस्वस्थतेमागचं नेमकं कारण मला अचानक उमगलं ते त्या रात्री मी अंथरुणाला पाठ टेकून शांतपणे अलगद डोळे मिटले तेव्हा! मनातली रुखरुख मग अधिकच तीव्र झाली. एखादं अनामिक असं संकट पुढं दबा धरून बसल्याची ती चाहूल मला स्वस्थ झोपू देईना. मी ताडकन् उठलो. आत आलो. दिवा लावला. देवघरासमोर नतमस्तक होऊन उभा राहिलो. समोरच्या दत्तमूर्तीच्या चेहऱ्यावरचं मंद स्मित तसंच होतं. आता जे कांही सांगायचं ते इथंच आणि याच क्षणी! समोर पाटावर बसून मी हात जोडले. अलगद डोळे मिटले आणि…..? मनात रुतून बसलेली, मला नुकतीच जाणवलेली ती रुखरुख नि:शब्दपणे ‘त्या’च्या समोर व्यक्त होत राहिली. मन शांत झाल्यावर मी अलगद डोळे उघडले तेव्हा मनातली रुखरुख नाहीशी झाली होती! आता जे होईल ते ‘तो’ म्हणेल तसंच या विचाराच्या स्पर्शाने मनातला अंधार विरुन गेला होता! मनावरचं ओझं त्याच क्षणी हलकं झालं. पण माझ्या आयुष्यातल्या नव्या पर्वाची तो क्षण हीच आश्वासक सुरुवात ठरणाराय याची मात्र मला कल्पना नव्हती..!

क्रमश:…  (दर गुरूवारी)

©️ अरविंद लिमये

सांगली (९८२३७३८२८८)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “भक्तांनो, केव्हा होणार सावधान?” ☆ श्री जगदीश काबरे ☆

श्री जगदीश काबरे

☆ “भक्तांनो, केव्हा होणार सावधान?☆ श्री जगदीश काबरे ☆

एखादा बुवा सपशेल उघडा पडतो आणि चौकशीनंतर त्याच्या या आधीच्याही अनेक भानगडी उजेडात येऊ लागतात. अशा वेळी बेगडी संताबद्दलची समाजात असलेली अंधश्रध्दा गळून पडायला हवी अशी आपण अपेक्षा करतो. पण नेमके होते याच्या उलटच. अशा तथाकथित संतांच्या समर्थनार्थ आंदोलने होतात. त्याला वाचवण्यासाठी लोक रस्त्यावर येतात. त्याने बळकावलेल्या जमिनी-अतिक्रमणे त्याचे भक्त कायदेशीर मार्गाने परत घेऊ देत नाहीत. लोक कायद्यांपेक्षा आणि संविधानापेक्षा एखाद्या व्यक्तीला मोठे समजू लागतात. अमूक एक संत म्हणजे धर्म असे लोक मानू लागतात. तो संत कितीही उघडा पडला तरी त्याच्यासारख्या दुसर्‍या बुवांच्या प्रसिध्दीला येतो… ओहटी लागत नाहीच. पण ज्याच्यावर आरोप होतात तोही संत म्हणून जनमानसाच्या मनातून उतरत नाही. त्याचे स्थान अढळ राहते. बाकीचे स्वयंघोषित तथाकथित संतही ह्या बुवाचे समर्थन करतात. कालची घटना आज लोक सहज विसरून जातात. हा काय प्रकार आहे? हा कोणत्या प्रकारचा विश्वास आहे? हे कोणते गारूड आहे? ही कोणती श्रध्दा आहे? ही कोणती मानसिकता आहे? कळायला मार्ग नाही.

तथाकथित संत, त्यांच्या लीला, त्यांचे सत्संग, दरबार, सोहळे पाहिले तर कुबेराचे वैभव कशाला म्हणतात ते लक्षात येते. तीच गोष्ट आजच्या सार्वजनिक उत्सवांची. सगळ्या सार्वजनिक उत्सवांचा आपण बट्याबोळ करून टाकलाय. इतक्या प्रंचड गर्दीतून दर्शनाला येणारे तथाकथित भक्त स्त्रियांना नको तिथे स्पर्श करत असलेले दिसतानाही कोणीही आक्षेप घेत नाही. हे जास्त धक्कादायक आहे. याच गणपती उत्सवाच्या काळात पूर्वी अनेक प्रबोधनाचे कार्यक्रम केले जात. अजूनही लोकांना विविध क्षेत्रातील प्रबोधनाची नितांत गरज आहे हे रोज लक्षात येऊनही असे कार्यक्रम आखले जात नाहीत.

गणपती उत्सव, गोकुळाष्टमीची दहीहंडी आणि नवरात्रीतल्या गरब्यांचे आज पूर्णपणे मार्केटींग झाले आहे. या उत्सवप्रियतेतील कर्मकांडांनाच आपण धर्म म्हणू लागलो आहोत… उधळपट्टीच्या उत्सवांना आपण श्रध्दा म्हणू लागलो आहोत… चंगळवादाला आपण संस्कृती म्हणू लागलोत… ‍अतिशय नियोजनबध्दपणे लोकांच्या धार्मिक श्रध्दांचे मार्केटींग करणार्‍यांच्या हातचे आपण दिवसेंदिवस बाहुले बनत चाललोत. हे कोणाच्याच कसे लक्षात येत नाही?

तुकारामादी संतांनी सांगितले आहे की, धर्म म्हणजे तत्व, धर्म म्हणजे कर्तव्य, धर्म म्हणजे समाजात वागण्याची आचारसंहीता. धर्म म्हणजे नीती-नियम. धर्म आणि श्रध्दा ह्या सार्वजनिक जीवनात अरेरावी पध्दतीने मिरवण्याच्या गोष्टी नाहीत. धर्माची सां‍केतिक कर्मकांडे पाळायची तर ती आपल्या घरात पाळायची असतात. धार्मिक स्थळांमध्ये पाळायची असतात. पण धर्म आता आक्रमकपणे रस्त्यावर येऊ लागला आहे. शाळा-कॉलेजात येऊन बसू लागला आहे. विधीमंडळात, संसदेत वावरू लागला आहे. कार्यालयांतही घुसू लागला आहे. एवढेच काय पण मोठमोठ्या इमारतींच्या संकुलातसुद्धा घुसला आहे. जसे ग्लोबलायझेशनमुळे साध्या दुकानांच्या जागी मॉल येऊ लागलेत तशी धार्मिक स्थळेही चकाचक होऊन मार्केटींग करू लागलीत. धर्मात मार्केट सुरू झाले की मार्केटात धर्म गेला हे समजायला मार्ग उरला नाही. या सगळ्यात भयानक गोष्ट म्हणजे आधी फक्त समाजकारणात राजकारण होत असे. आता कोणत्याही क्षेत्रात राजकारण होऊ शकते. म्हणून सावधान.

© श्री जगदीश काबरे

मो ९९२०१९७६८०

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “धर्म ज्याचा त्याचा…!” ☆ सुश्री शीला पतकी ☆

सुश्री शीला पतकी 

🌸 विविधा 🌸

☆ “धर्म ज्याचा त्याचा…!” ☆ सुश्री शीला पतकी 

धर्म हा खर तर इतका मोठा विषय आहे त्याच्यावर किती जणांनी तरी मोठे मोठे विचार मांडून ठेवलेले आहेत आपण काय बोलणार फक्त सहज विचार आला, अनेक वाचलेले आठवले, म्हणून हा विचार….. आपल्या घरामध्ये अनेक खोल्या असतात… म्हणजे झोपायची खोली स्वयंपाकाची खोली धान्याची खोली आणि इतर अन्य खोल्या तशी एखादी हवेची खोली असं असत नाही कारण प्रत्येक खोलीत हवा असतेच तसा धर्म सुद्धा वेगळा करता येत नाही तो व्यवहारातही असतो, प्रत्येक व्यवहारात असतो.

मातृधर्म पितृ धर्म पुत्रधर्म पुत्रधर्म शेजारधर्म आचार्य किंवा अध्यापक धर्म ज्यामध्ये उत्तम आचरणाचेच मार्ग सांगितलेले असतात उदाहरणार्थ मुलाने आपल्या मात्यापित्या संबंधात कुटुंब संबंधात कसे वागले पाहिजे कशा जबाबदाऱ्या घेतल्या पाहिजेत आई-वडिलांना कसे सांभाळले पाहिजे आणि हे सगळं त्याने आयुष्यात व्यवस्थित केलं की त्याचा पुत्र असण्याचा धर्म त्यांनी पाळला. शेजार धर्म… शेजाऱ्यांना गरजेप्रमाणे वेळोवेळी ते आपले नातलगच आहेत असे समजून किंवा ते कुटुंबातीलच आहेत असे समजून मदत करणे मदतीला धावून जाणे त्यांच्या वाईट काळामध्ये त्यांना आधार देणे अशा अनेक गोष्टी आपण करत असतो त्यामुळे आपल्या नातलगा पेक्षाही शेजारी महत्त्वाचा असतो कारण मदतीला येणार तो पहिला आहे. आशा माणसासाठी सुद्धा धर्मांन काही कर्तव्य सांगितले आहेत शेजारी दुःखद घटना घडली तर आपण आपल्या घरात जेवत बसत नाही आपणही त्या दुःखद घटनेत सामील असतो त्यानंतर त्यांचे दुःख कमी करण्याचा प्रयत्न करतो त्यांना सर्व तोपरी मदत करतो मानसिक आधार देतो नातेवाईक चार दिवसानंतर निघून जातात पण खरा मदतगार असतो तो शेजारी…. त्यासाठी धर्म सांगितला आहे

व्यापारातही धर्म आहेत प्रत्येक उद्योगाचा एक धर्म आहे आता गवळ्याने आपल्याला म्हशीचे किंवा गायीचे उत्तम दूध द्यावे हा त्याचा धर्म आहे पण त्यांनी आपला धर्म सोडला त्यामुळे त्याचा धंदा झाला आणि व्यवसाय संपला लोकांच्या जीवाची परवा न करता एखादी गोष्ट विकणे हे व्यवसायात बसत नाही हे व्यवसाय धर्माच्या विरोधात आहे. तारखा निघून गेलेल्या वस्तूच्या तारखा बदलून म** विकणे हा अधर्म आहे ही संकल्पना जवळजवळ संपत आली….. मला आठवते माझे वडील सांगायचे ती गोष्ट… सोलापूरमध्ये एक मारवाडी गृहस्थ, टिळक चौकात त्यांचे दुकान होते ते ऋषिपंचमीचे सामान विकत पंचमीचे व्रत करणाऱ्या सर्व स्त्रियांसाठी तेथूनच सामान घेऊन जात त्यामध्ये भगर काही भाज्या याचा समावेश असे त्याचे वैशिष्ट्य असे की त्या दिवशी बैलाच्या कष्टाचे काही खावयाचे नाही या गृहस्तांची सोलापूर पासून जवळच शेती होती आणि त्या शेतामध्ये ते खास या व्रत्तासाठी पीक काढत असत ते रेल्वेने सोलापूरला आणले जाई पण एके वर्षी नव्याने नेमलेल्या त्यांच्या मुनीमाने ते रेल्वे स्टेशन ते टिळक चौक येथे बैलगाडीत घालून आणले त्यांना त्या गोष्टीचे खूप वाईट वाटले कारण ते आता बैलाच्या कष्टाचे धान्य झाल्यामुळे विकू शकत नव्हते आणि त्यांनी यंदा ऋषीपंचमीचे सामान मिळणार नाही असा बोर्ड लावला याला म्हणतात व्यवसाय धर्म वास्तविक पाहता हे गृहस्थ तो म** विकू शकले असते बैलगाडीत घालून आणले हे लोकांना कुठे कळणार होते पण त्यांचा व्यवसाय धर्म त्यांना हे करू देत नव्हता आता ही निष्ठा कुठे राहिली आहे तेव्हा व्यवसायातही धर्म पाळणारे लोक होते

वैद्यकीय क्षेत्रामध्ये मी एक डॉक्टर पाहिले त्यांची विवेकानंदांवर विलक्षण श्रद्धा होती त्यांच्या दवाखान्यात विवेकानंदांचा फोटो होता ते प्रत्येक पेशंटसाठी औषध देताना ते औषध ठेवत विवेकानंदांना नमस्कार करत प्रार्थना करत आणि लवकर बरे वाटावे अशी कामना व्यक्त करून त्या पेशंटला औषध देत या त्यांच्या निष्ठेमुळे पन्नास टक्के प्रभाव पेशंटवर पडत असे ही त्यांची वैद्यकीय क्षेत्रावरची भक्ती होती हा त्यांचा धर्म होता

अमेरिकेमध्ये एकदा एक 12/ 14 वर्षाचा मुलगा जो वसतिगृहात राहत होता त्याने खोकल्याच्या औषधाची बाटली घेतली आणि तो गेला दुकानदाराच्या लक्षात आले की शेक वेल म्हणजे औषध घेण्यापूर्वी ते हलवून घ्या याचे लेबल त्याच्यावरती लावले गेले नव्हते त्यांनी ताबडतोब त्या मुलाच्या वसतीगृहाचा शोध घेतला पण त्या काळात मोबाईल नव्हते त्या वसतिगृहात जाऊन तातडीने त्या मुलाला भेटून औषध घेण्याची माहिती दिली हा झाला त्याचा विक्रेता धर्म अशी धर्मपरायण माणसे आजही पाहायला मिळतात धर्म म्हणजे रंग नव्हे, रंगाचा बेरंग करणे हे नव्हे, कुठल्यातरी रंगाचा उल्लेख दहशतवाद असा करणे तेही चुकीचे आहे. धर्म म्हणजे नीतीने वागणे आणि इतके आपल्याला समजले तरी धर्म समजला म्हणावयास हरकत नाही.

// शुभम भवतु //

© सुश्री शीला पतकी

माजी मुख्याध्यापिका सेवासदन प्रशाला सोलापूर 

मो 8805850279

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “डोकेदुखी आणि गोळी…” ☆ श्री कौस्तुभ परांजपे ☆

श्री कौस्तुभ परांजपे

? विविधा ?

☆ “डोकेदुखी आणि गोळी…” ☆ श्री कौस्तुभ परांजपे

मी थोडासा बेचैन होतो. कारण माझं डोकं दुखत होतं. आता माझ्या चेहर्‍यावरुन कदाचित काहीतरी दुखतयं हे जाणवत असेल. पण सांगता येत नव्हत. याला महत्वाची दोन कारणं होती.

पहिलं कारण, मंडळीपण सकाळचं पटापट आवरुन वेळेवर ऑफिस गाठण्याच्या तयारीत समोर येइल आणि दिसेल ते काम हातावेगळं करण्याच्या धावपळीत होती. रोजची रस्त्यावरची शिस्तबद्ध बेशिस्त रहदारी, आणि चुकवू म्हटले तरी मधे येणारे खड्डे या डोकेदुखीत माझ्या डोकेदुखीची डोकेदुखी तिच्या डोक्याला नको… असाच विचार होता. माझ्या डोकेदुखीची डोकेदुखी तिला नको… असा विचार मनात आल्यावर प्रसार आणि विस्तार या शब्दांची उगाचच आठवण झाली. तसच ज्योत से ज्योत जलाते चलो… हे इथे समर्पक नसलेले गाणंसुध्दा आठवलं.

दुसरं कारण… त्यांच म्हणणं असतं… घाईगर्दीत कमीतकमी मनाला पटेल अशी कारणं सांगत जा… उगाचच वेळ जातो.

हे म्हणजे माझ्या दुखण्यापेक्षा त्यांचा माझ्या डोक्याबद्दल असलेला नितांत आदर आणि विश्वास होता. आणि या आदर आणि विश्वासाला तडा जाणं कठिण होत.

माझं डोकं या बद्दल त्यांना असलेला आदर हा कायम महागाईच्या वाढत्या निर्देशांकासारखा वाढताच होता. त्यात घसरण कधी दिसलीच नाही. आणि दिसली तरी इतकी अल्पकाळ होती की जाणवली नाही. आता जाणवायला परत डोक्याचा संबंध आलाच…

पण कसं कोणास ठाऊक, माझी डोकेदुखी तीने हेरली असावी. जाताजाता तीने पटकन एक औषधाची गोळी टेबलवर ठेवली. आणि तोंडाने फक्त… हं… येवढाच पण विश्वास असणारा आवाज ऐकू आला. हं… या विश्वासदर्शक आवाजाची आता इतकी सवय झाली आहे की वेळ… काळ… आणि स्थळ… कुठलही असलं तरी हं… हा आवाज आल्यानंतर आता आपल्याला नक्की काय करायचं आहे याचा अंदाज घेण्याआधीच कधी कधी कृतीला सुरुवात होते. इतका विश्वास त्यांच्या नुसतं हं… म्हणण्यात आहे.

टेबलवरची गोळी हातात घेत मी सहज विचारलं. कोणती गोळी आहे. आणि होती घरात. मला लक्षातच नाही…

त्यावर परत ऊत्तर. मागच्याच आठवड्यात तुमचे गुडघे दुखत होते तेव्हा डाॅक्टरांनी लिहून दिलेलीच आहे. आणि या गोळीने गुडघा दुखायचा थांबत असेल तर डोकं का थांबणार नाही. नाहीतरी कधीतरीच ते जागेवर असतं. बाकी त्याचा मुक्काम तिथेच जाणवतो. आणि थोड्यावेळाने गुडघे दुखायची तक्रार होइलच. कारण आज सकाळपासून बराच वेळ गॅलरीत ऊभे राहून येरझारा जास्तच झाल्या आहेत. दोनदा तर चार मजले उतरुन चढून झाले आहेत. कशासाठी? … ते सावकाश सांगते संध्याकाळी. पण एकाच गोळीत दोन्ही कामं होतात का बघू…

मी निघते. ऊशीर होतोय. गोळी घेतलीत तर दोन्ही दुखणी थांबली नाहीत तरी एक थांबायला हंव. या विश्वासाने ओतप्रोत भरलेल्या वाक्याने समारोप झाला असला तरी, संध्याकाळच्या चर्चेची नांदी त्यात जाणवली.

©  श्री कौस्तुभ परांजपे

मो 9579032601

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ मोदक…☆ सौ शालिनी जोशी ☆

सौ शालिनी जोशी

🔅 विविधा 🔅

☆ मोदक… ☆ सौ शालिनी जोशी

भाद्रपद महिना म्हटलं की डोळ्यासमोर येते प्रसन्न गणेश मूर्ती. आणि गणेश म्हटलं की मोदक हवाच. जिथे गणेश तिथे मोदक. मोदक करायला तसा अवघड. गृहिणीच्या कलागुणांना मुक्त वाव येथे आहे.

स्वच्छ धुतलेल्या बासमती तांदुळाची शुभ्र पिठी आणि गुळ व खोबरे यांचे योग्य प्रमाणातील मिश्रण शिजवून केलेले सारण ही याची पूर्वतयारी. त्या सारणात सुकामेवा, वेलदोडे, जायफळ, खसखस घातल्यास त्या खमंग सारणाला अपूर्व सुगंधही येतो. गणपतीच्या आधीच चार दिवसापासून ही तयारी सुरू असते. कारण स्वागताच्या पहिल्या दिवशीच्या नेवैद्याला २१ मोदकांचे ताट गणेशा पुढे ठेवायला गृहिणी उत्सुक असते. या मोदकाचे वैशिष्ट्य म्हणजे उकड. पीठ व पाणी यांच्या योग्य प्रमाणाला चांगली वाफ आली की उकड तयार. हाताने मळलेल्या उकडीचा एक छोटा गोळा घेऊन त्याची पापडी करायची. त्यावर पुरणाचा गोळा ठेवायचा आणि सुंदर कळ्या पाडून मोदकाचे तोंड बंद करायचे. कळ्या जेवढ्यां नाजूक आणि त्यांची संख्या जास्त, तेवढे करणाऱ्याचे कौशल्य जास्त. असा हा मोदक वाफेवर उकडला जातो. त्यामुळे त्याची चव वाढते. तुपाबरोबर तर छानच. असा हा मोदक गणपतीला आवडतो आणि त्याच्यामुळे सर्वांनाच मोदकाचा भोग घेता येतो. मोठ्या मोदकावर लहान मोदकही करतात. हे कौशल्याचे काम.

पुराण कथा मधूनही मोदकाचा उल्लेख आढळतो. त्यातील एक कथा. अत्री ऋषींची पत्नी अनुसया. तिने आदराने भगवान शंकर, देवी पार्वती आणि गणेश यांना भोजनाला निमंत्रित केले. विविध पक्वान्न युक्त भोजन स्वाहा करूनही गणपती बाप्पाची भूक भागली नाही. मग तिने झटपट करून एक नवीन पदार्थ तयार केला. आणि अहो आश्चर्य! त्याच्या सेवनाने बाप्पाचे पोट भरलं. त्याने २१ वेळा ढेकर देऊन तृप्तीची पोचपावती दिली. देवी पार्वतीने कुतूहुलाने पदार्थाची कृती व नाव विचारले. तोच हा मोदक. तेव्हापासून २१ मोदकांचा नैवेद्य गणपतीला दाखवल्या जातो.

आता उकडीच्या आणि तळणीच्या मोदकाखेरीज सुकामेवा, चॉकलेट, खवा यांचे विविध रंगाचे मोदकही केले जातात. ओरिसा, आसाम, कर्नाटक, तामिळनाडू, केरळ मध्येही मोदक करतात. नावे वेगळी करण्याची पद्धत थोडी वेगळी.

परमार्थात मात्र या मोदकाला वेगळा अर्थ आहे मोद म्हणजे आनंद आणि क म्हणजे लहानसा भाग. म्हणून आनंद प्राप्त करून देणारा मोदक ज्ञानेश्वर ज्ञानेश्वरीत गणेशाच्या सहा हाताना सहा दर्शने म्हणतात आणि त्यातील वेदांत दर्शन रूप हातात मोदक दाखवतात. वेदांत दर्शन हे परमानंदाची, ब्रह्मानंदाची प्राप्ती करून देणारे, त्याची थोडीशी झलक किंवा थोडीशी अनुभूती देणारा हा मोदक. मोदक खाल्ल्यावर कुणाला आनंद होत नाही? मोदकाने मिळणाऱ्या आनंदाच्या कितीतरी पट आणि अखंड आनंद म्हणजे ब्रह्मानंद. मोदकाची चव थोडा वेळ जिभेवर राहते थोडा काळ आनंदाची अनुभूती देते पण ब्रह्मानंद अखंड आनंद देतो, प्रसन्नता देतो. म्हणून अशा आनंदाचे प्रतीक असा हा मोदक.

मोदक हे ज्ञानाचे प्रतीक. ज्ञान प्रथम थोडे वाटते. पण अभ्यास करू लागल्यावर त्याचा विस्तार लक्षात येतो. तसाच मोदक टोकाकडून खाली खाली मोठा मोठा होत जाणारा. गोडी व आनंद वाढविणारा. एकंदरीत गणेश व त्याचा मोदक म्हणजे ज्ञानाचा व आनंदाचा कंद.

©  सौ. शालिनी जोशी

संपर्क – फ्लेट न .3 .राधाप्रिया  टेरेसेस, समर्थपथ, प्रतिज्ञा मंगल कार्यालयाजवळ, कर्वेनगर, पुणे, 411052.

मोबाईल नं.—9850909383

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares