☆ मनाचे श्लोक – एक सार्वकालिक ‘मनोपनिषद’… – श्लोक ४३ आणि ४४ ☆ श्री विश्वास देशपांडे ☆
श्लोक क्र. ४३ – – –
मना सज्जना एक जीवी धरावे|
जनी आपुले हीत तुवा करावे|
रघूनायकावीण बोलो नको हो |
सदा मानसी तो निजध्यास राहो|४३|
अर्थ :हे सज्जन मना, आपल्या जीवाशी एक खूणगाठ बांधून ठेव. जीवनामध्ये आपले तू कल्याण करून घे. एकदा भगवंताशिवाय अन्य गोष्टी बोलण्याचे सोडून दे. सदासर्वदा आपल्या मनाला त्याचाच ध्यास लागू दे.
विवेचन :आपले कल्याण व्हावे ही समर्थांची तळमळ मनाच्या श्लोकांमध्ये ठायी ठायी जाणवते. म्हणून पुनरुक्तीचा दोष पत्करून काही गोष्टी ते पुन्हा पुन्हा सांगतात. आपल्या मनाला उपदेश करताना ते म्हणतात, ” हे सज्जन मना, एक गोष्ट आपल्या जीवाशी निश्चित करून ठेव. तुला जर तुझे कल्याण करून घ्यायचे असेल तर रघुनायकाचा म्हणजे भगवंताचा ध्यास घे. त्याच्याशिवाय दुसरे काही बोलू नको. “
व्यवहारात आपल्या वाणीला म्हणजे बोलण्याला अतिशय महत्त्व असते. आपल्या बोलण्यावरून आपले व्यक्तिमत्व लोकांना समजते. म्हणून व्यवहारात लोकांशी आवश्यक तेवढे बोलावेच लागेल. व्यवहार सोडता येणार नाही. समर्थांनी देखील “आधी प्रपंच करावा नेटका” असे सांगितले आहे. पण जेव्हा व्यवहारातील बोलणे संपेल तेव्हा आपल्या मुखातून भगवंताचे नामच बाहेर पडले पाहिजे. असे नाम सातत्याने येण्यासाठी मनामध्ये त्याचा विचार हवा कारण जसा विचार, तसा उच्चार आणि तसा आचारही होतो.
हा झाला बाह्य आचार. एक वेळ मुखात भगवंताचे नाम येणे, भगवंताबद्दल बोलणे सहज जमू शकते. पण आपल्या अंतरंगात भगवंताचे अनुसंधान टिकवणे सोपे नाही. त्याच्यासाठी सतत जागेपणी जेवढे शक्य होईल तेवढे भगवंताचे नाव घेत राहण्याचा अभ्यास करायला हवा. इंग्रजी शब्दांचा वापर करून सांगायचे झाले तर ट्वेंटी फोर बाय सेव्हन भगवंताच्या नामाचा ध्यास असायला हवा. ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज म्हणतात तुम्ही जागेपणी मनाला नाम घेण्याची सतत सवय लावून घ्या. एकदा हे साधले की मग तुमच्या झोपेत किंवा तुमच्या आजारपणात देखील आपोआप हे नाम घेतले जाईल.
हे विवेचन वाचत असताना आपल्याला असे वाटेल की हे म्हणजे फारच झाले व्यवहारात आपल्याला एवढे शक्य नाही. परंतु समर्थांचे हे सांगणे आपल्यासारख्या सर्वसामान्यांसाठीच आहे. आपण भगवंताचे नाम का घ्यायचे ?त्याची भक्ती का करायची ? तर आपण साधना मार्गावर चालणारे साधक आहोत. सुरुवातीलाच समर्थांनी आपल्याला “गमू पंथ अनंत या राघवाचा” असे सांगितले आहे. ही गोष्ट एकदा मान्य केली की मग समर्थांचा उपदेश सहज पचनी पडतो.
जसे रोग्याला डॉक्टरांनी सांगितलेले पथ्य पाळणे त्याच्या हिताचे असते, तसेच साधकाला देखील काही गोष्टींची पथ्ये असतात. ती त्याने सांभाळायला हवीत. तुकाराम महाराज म्हणतात, ” जेणे विठ्ठल मात्रा घ्यावी, तेणे पथ्ये सांभाळावी. ” आपण साधक आहोत आणि परमेश्वराची प्राप्ती हे आपले साध्य आहे. हे जीवनध्येय एकदा ठरले की मग पुढील वाटचाल सोपी होते. परमेश्वराच्या नामात रममाण व्हायचे की लोकांमध्ये मिसळून आपला वेळ अन्य गोष्टींमध्ये व्यर्थ घालवायचा ? यातील कोणती गोष्ट निवडायची हे खऱ्या साधकाला सांगावे लागत नाही. आपल्या परमार्थाला हानिकारक होतील अशा गोष्टींपासून खरा साधक दूरच राहतो. “विठ्ठल आवडी प्रेमभावो, विठ्ठल नामाचा रे टाहो… ” असे संत नामदेव म्हणतात. तसेच आपलेही झाले पाहिजे.
स्वसंवाद ::
१) माझ्या दिवसातील किती वेळ भगवंताचे नाम किंवा विचार माझ्या मनात असतो – प्रामाणिकपणे सांगायचे तर किती टक्के ?
२) “जसा विचार, तसा उच्चार, तसा आचार” – माझे विचार, बोलणे आणि वागणे यात सुसंगती आहे का ?
३) साधकाला पथ्य असते – माझ्या परमार्थाला हानिकारक कोणती सवय मी अजून सोडलेली नाही ?
४) गोंदवलेकर महाराज म्हणतात जागेपणी नामाची सवय लावा – मी आज या क्षणापासून हे सुरू करण्यास तयार आहे का ?
– – – –
श्लोक क्र. ४४ – –
मना रे जनी मौन्य मुद्रा धरावी |
कथा आदरे राघवाची करावी |
नसे राम ते धाम सोडोनी द्यावे |
सुखालागि आरण्य सेवीत जावे |४४|
अर्थ :हे मना, समाजात वावरताना शक्यतो मौन धारण करावे. बोलायचेच झाले तर अत्यंत आदराने श्रीरामाचे गुणगान करावे. ज्या ठिकाणी श्रीरामाबद्दल म्हणजेच भगवंताबद्दल प्रेम नाही अशा ठिकाणी राहू नये. ते ठिकाण तत्काळ सोडून द्यावे. भगवंताच्या नामातील सुख प्राप्त करण्यासाठी खुशाल अरण्यात जाऊन राहावे.
विवेचन : मन म्हणजे विचार करणे. ज्याला मन आहे तो माणूस ! म्हणजेच जो विचार किंवा चिंतन करू शकतो तो माणूस होय. मौन हा शब्द देखील मन या धातूपासून तयार झाला आहे. केवळ न बोलणे म्हणजे मौन नव्हे तर ज्याच्या अंतरात भगवंताच्या नामाचे चिंतन सुरू आहे आणि अन्य काही बोलण्याची ज्याला आवश्यकता राहत नाही अशी गोष्ट म्हणजे मौन. अशी व्यक्ती केवळ भगवंताचे गुणगान करण्याकरताच बोलते. त्याचीच कथा सांगते.
मौनाचा हा अर्थ साधकांसाठी सांगितला आहे. अनेक लोक आपला स्वार्थ साधण्यासाठी सोयीस्कर मौन धारण करतात. त्या अर्थाने मौन हा शब्द इथे अपेक्षित नाही. “मौनम् सर्वार्थ साधनं” असे एक प्रसिद्ध संस्कृत वचन आहे. मौनाने सर्व काही साध्य होते असा त्याचा अर्थ आहे. जे लोक मौन पाळतात आणि वायफळ बडबड करत नाहीत, अशांच्या वाणीला सामर्थ्य प्राप्त होते. आपण बोलून जे साध्य करू शकत नाही ते मौनाने साध्य होते. अशा वेळी मौन हेच शस्त्र आणि शास्त्र ठरते. सतत बडबड करणाऱ्या लोकांच्या बोलण्याला लोक फारशी किंमत देत नाहीत.
काही अपवादात्मक साधुसंत खरोखरच साधनेसाठी मौन धारण करतात. परंतु बरेचसे साधू मौन तर धारण करतात, परंतु त्यांच्याकडे कोणी आले आणि त्यांना काही विचारले तर ते हातवारे करून बोलतात किंवा आपले म्हणणे पाटीवर लिहून सांगतात. काही साधुसंतांनी मौनाच्या काळात ग्रंथ देखील लिहिल्याचे ऐकण्यात येते. असे मौन खऱ्या अर्थाने पूर्ण मौन म्हणता येणार नाही.
समर्थांनी जनी मौन्यमुद्रा धरावी असे म्हटले आहे. एक वेळ एकांतातील मौन सोपे आहे परंतु भोवती लोकांची गर्दी असताना सोपे नाही. विपश्यना शिबिरात तर खुणेने देखील बोलायचे नसते. अशा ठिकाणी माणसे दहा दिवस कसाबसा धीर धरतात. परंतु एकदा शिबिर संपले की दहा दिवसांची भर काढून घेतात.
जो खरा साधक असतो तो भगवंताच्या चिंतनात अंतर्बाह्य बुडालेला असतो. त्यामुळे त्याला इतर अनावश्यक बडबड करण्याची आवश्यकता भासत नाही. तो जेव्हा बोलतो तेव्हा आपल्या वाणीने भगवंताच्या गुणांचे वर्णन करतो, भगवंताचे कीर्तन करतो.
जेथे त्याला सुखाने राहून भगवंताचे गुणगान करता येते असे ठिकाण म्हणजे त्याच्या दृष्टीने स्वर्ग. परंतु अशीही काही ठिकाणी असतात की जेथे भगवंताचे चिंतन नामस्मरण केलेले आवडत नाही. भगवंताला न मानणारी माणसे अशा ठिकाणी राहतात. अशा ठिकाणी खऱ्या भक्ताला राहणे कठीण होते. अशा ठिकाणी त्याचा आणि भगवंताचा देखील अवमान होतो. म्हणून ज्या ठिकाणी भगवंताचा अनादर होतो आहे, निंदा होते आहे असे दिसले तर ते ठिकाण तत्काळ सोडावे.
अशाप्रसंगी वनात जाऊन देखील राहण्यास हरकत नाही तेथे सुखाने भगवंताचे नाम घेता येते त्याच्या स्मरणात राहता येते संत तुकाराम महाराज म्हणतात, ” येणे सुखे रुचे एकांताचा वास, नाही गुणदोष अंगा येत. आकाश मंडप, पृथ्वी आसन, रमे तेथे मन क्रीडा करी. ” साधकाला मग अशा एकांतातील सुख अनुभवता येते कुठलाही व्यत्यय न येता परमेश्वराचे नामस्मरण घडते. परमेश्वराच्या चिंतनासाठी अनेक संतांनी जनामध्ये राहणे सोडून वनामध्ये निवास केला त्याचे कारण हेच आहे.
सध्या काळ बदलला आहे. हल्ली समर्थांच्या सांगण्याप्रमाणे वनात जाऊन निवास करणे सर्वसामान्य माणसांसाठी सोपे नाही. हल्ली रोजच्या व्यवहारात शांतता मिळणे कठीण झाले आहे. तीर्थस्थानांना देखील बाजारू स्वरूप प्राप्त झाले आहे. जिथे सुखाने भगवंत चिंतन करता येईल अशा जागा मिळणे कठीण झाले आहे. अशा वेळी आरण्य सेवन याचा अर्थ एकांत सेवन असा घ्यायला हरकत नाही. ज्या ठिकाणी सुखाने आपल्याला हरीचे नाम घेता येईल असे ठिकाण म्हणजे अरण्यच असे म्हटले तर हरकत नाही.
स्वसंवाद ::
१) माझ्या बोलण्यात किती वेळ भगवंताचे गुणगान असते आणि किती वेळ निरर्थक गोष्टी असतात ?
२) मला भगवंत चिंतनासाठी मौन आवश्यक आहे ही गोष्ट पटते का ?
३) ज्या ठिकाणी भगवंताचा अनादर होतो अशा ठिकाणी राहणे मला जड जाते का, की मी त्याशी तडजोड करतो ?
४) माझ्या दैनंदिन जीवनात “आरण्य” म्हणजे एकांताची जागा कोणती आहे आणि मी ती नियमितपणे वापरतो का ?
☆ मला समजलेली संत तुकारामांची गाथा… भाग – २१ ☆ अरुणा मुल्हेरकर ☆
मायाजालात अडकलेला सर्वसामान्य माणूस प्रपंचात अडकलेल्या सर्वसामान्य माणसांसाठी सुद्धा तुकाराम महाराजांनी गाथेत भरपूर अभंग लिहिले आहेत. सर्वसामान्य माणसांना ऐहिक जीवनाचा लोभ असतो, त्यातून त्यांना परावृत्त होणे फार अवघड आणि कष्टाचे असते. तुकाराम महाराज या संदर्भात आपल्यासारख्या सामान्यांना अत्यंत कळकळीने त्यांच्या वाणीत जागोजागी सांगत आहेत.
आहे ते सकळ कृष्णासी अर्पण/
* नकळता मन तुझे भावी*//
म्हणवुनी पाठी लागतील भुते/
येती गिवसीत पाच जणे//
ज्याचे त्या वंचले आठव न होता/
दंड न हा निमित्त कारणे//
तुका म्हणे काळे चेपीयला गळा/
मी मी वेळोवेळी करीतसे//
आपण प्रापंचिक लोक हे जाणतच नाही की जी काही कर्मे आहेत, आणि जे जे काही अस्तित्वात आहे ते एका कृष्णाच्या सत्तेने आहे. कर्ता-करविता तोच आहे. आपण अविवेकी, हे जाणत नाही आणि सर्व काही मी केले अशी मनात भावना धरतात. त्यामुळे “येती गिवसित पाच जणे”, म्हणजे आपला पंचमहाभूतांचा हा देह आपल्याला शोधत येतो. याचाच अर्थ आपण जन्म मरणाच्या चक्रातून फिरत राहतो, आपला पुनर्जन्म होतो. सर्व कर्मे हरीचीच असून ती त्याची त्याला अर्पण करण्याची आठवण न ठेवल्यामुळे आपल्याला जगण्याचा आणि मरणाचा दंड मिळतो. हा दंड भोगायचा नसेल त्याने प्रथमतः अहंकाराने मी मी करणे सोडून दिले पाहिजे. ज्यावेळी अशी अवस्था होईल त्याचवेळी लोभ, मोह, सर्व मायापाश यातून माणसाची कायम सुटका होईल.
ते सामान्य संसारी माणसाला सांगतात,
वृत्ती भूमी राज्य द्रव्य उपर्जीती/
जाणार त्या निश्चिती देव नाही//
भाडेकरी वाहे पाठीवरी भार/
अंतरीचे सार लाभ नाही//
देवपूजेवरी ठेवूनिया मन/
पाषाणा पाषाण पूजी लोभे//
तुका म्हणे फळ चिंतीती आदर/
लाघव हे चार शिंदळीचे//
फळाची इच्छा मनात ठेवून प्रपंचासाठी अर्थार्जन करणाऱ्या प्रापंचिकांविषयी तुकाराम महाराज वरील अभंगात सांगत आहेत. एखादा चरितार्थाचा व्यवसाय मिळवून जमीन, घर, द्रव्य, राज्य, प्राप्त करून घेणारे जे लोक असतात त्यांनी परमार्थात कितीही धडपड केली, तरी त्यांना परमेश्वर प्राप्ती होणे असंभवनीय आहे. ओझे वाहणारा भारवाहक त्याच्या हमालीचे पैसे घेईल, परंतु त्या ओझ्यातील सारभाग त्याला कसा मिळेल? काही एक प्राप्त करण्याची वासना मनात ठेवून जो देवपूजा करतो तो दगडाची पूजा करणारा दगडच म्हणावा लागेल. अनेक प्रकारचे उद्योग करून त्यापासून फलप्राप्ती इच्छिणारे जे लोक आहेत त्यांची सर्व धडपड म्हणजे तुकाराम महाराजांच्या मते गणिकेच्या शृंगाराप्रमाणे निंद्य आहे.
रोजच्या जीवनातील उदाहरणे घेऊन तुकारामांची सामान्यांना परिस्थिती पटवून, समजावून देण्याची पद्धत खरोखरच आपल्या मनाचा ताबा घेऊन त्या दृष्टीने आपल्याला विचार करण्यास लावणारी आहे. आता हे दोन अभंग पहा…
(1)
माया ब्रह्म ऐसे म्हणती धर्मठक/
आपणा सरिसे लोक नागविले//
विषयी लंपट शिकवी कुविद्या/
मनामागे नांद्या होऊनी फिरे//
करुनी खाता पाक जिरे सुरण राई/
करिता अतित्यायी दुःख पावे//
औषध द्यावया चाळविले बाळ/
दावूनिया या गुळ दृष्टी पुढे//
तरावया आधी शोधा वेदवाणी/
वांझट बोलणी वारा त्याची//
तुका म्हणे जया पिंडाचे पाळण/
न घडे नारायण भेट तया//
(2)
मृगजळ दिसे साचपणा ऐसे/
खोटीयाचे पिसे ऊर फोडी//
जाणूनी का करा आपुलिया घात/
विचारा रे हित लवलाही//
संचित सांगती बोळवण सवे/
आचरण द्यावे फळ लेणे//
तुका म्हणे रोखी स्मशान ते वरी/
संबंध गोवरी आगीसवे//
आपल्या देहाचे पालनपोषण करण्यातच आयुष्य वेचणाऱ्या आणि दुसऱ्यांना उपदेश करून स्वतः पापे करणाऱ्या लोकांविषयी पहिल्या अभंगात तुकाराम महाराज म्हणतात की, हे धर्माचे स्तोम माजविणारे लोक माया आणि ब्रह्म एकच आहे असे म्हणतात आणि याच धारणेने स्वैर वागतात व अज्ञान्यांना फसवितात. ( या लोकांना महाराजांनी धर्मठक ही अगदी योग्य संज्ञा दिली आहे.) विषयासक्त मनुष्य दुसऱ्याला कुविद्या शिकवतो आणि स्वतः नंदीबैलाप्रमाणे मन मानेल तिकडे जातो. सुरण आणि मोहरी शिजवून खाल्ली तरच पचन होते, अन्यथा कच्चे खाणाऱ्यांना दुःख भोगावे लागते. आजारी मुलाला कडू औषध देताना त्याची आई त्याला एवढे औषध घेतल्यावर गुळाचा खडा देण्याचे आमिष दाखवते. महाराज सांगतात की, हा भवसागर तरुन जाण्यासाठी त्याचा नीट विचार करून, ज्ञान संपादन करून ( सुरणासारखा शिजवून आणि स्वर्गरूपी गुळाचा खडा महत्त्वाचा न मानता त्याग रुपी औषध घ्यावे) हेच आयुष्याचे सार आहे. माया आणि ब्रह्म एकच आहे असे समजून आणि देहाला सर्वस्व मानून त्याचे चोचले पुरविणाऱ्यांना नारायणाचे दर्शन कधीही होणार नाही.
दुसऱ्याही अभंगात मृगजळापाठी धावणाऱ्या हरिणाचे उदाहरण देऊन तुकाराम महाराज सामान्यांना हीच गोष्ट अधिक पटवून देण्याचा प्रयत्न करतात. ज्याप्रमाणे मृगजळ हरिणांना खरे वाटते आणि ऊर फुटेपर्यंत मोठ्या आशेने हरणे तेथे धाव घेतात, त्याचप्रमाणे देहादिक प्रपंच खोटा आहे हे जाणूनही स्वतःचा घात करतात. स्वहित कशात आहे याचा विचार करीत नाहीत. जे आपले संचित कर्म आहे ते आपल्या बरोबर या जन्मातून त्या जन्मात येत राहते आणि पूर्वकर्माप्रमाणे ते भोगावे लागते. प्रपंचात्मक माणसाचा देह स्मशानात जातो, तेथे तो अग्नीमध्ये मिसळतो. ( अग्नीशी त्याचे लग्न लागते.) याचाच अर्थ असा की, त्याचा जन्म ईश्वर साधना न करता फुकट जातो.
संसारी लोकांबद्दल महाराज काय म्हणतात ते आपण या अभंगात पाहू.
काय एकाच जाले ते का नाही ठावे/
काय आहे सांगावे का म्हूण//
देखतील डोळा ऐकतील कानी/
बोलिले पुराणी तेही ठावे/
काय हे शरीर साच की जाणार/
सकळ विचार जाणती हा/
का हे कळो नये आपुले आपणा/
बाळत्व तारुण्य वृद्धदशा//
का हे आवडले प्रिया पुत्र धन/
काय काम कोण कोणा आले//
का हे जन्म वाया घातले उत्तम/
काहे राम राम न म्हणती//
काय भूली यांसी पडली जाणता/
देखती मरता आणिकांसी//
काय करीती हे बांधिलिया काळे/
तुका म्हणे बळे वज्रपाशी//
महाराजांना वाटते की, संसाराच्या संगतीने यांची ही काय दुर्दशा, अवस्था झाली आहे. यांना काय काय म्हणून सांगावे? प्रपंच संगतीने जीवाची किती दैना होते हे ते पाहतात, ऐकतात आणि पुराणातही सांगितलेले त्यांना माहित आहे. हे शरीर खरे आहे की नाशीवंत आहे याचे ज्ञान त्यांना आहे. कारण त्यांनी सर्व ऐकले आहे. आपल्या देहाला बाल्य, तारुण्य, वृद्धत्व या अवस्था अटळ आहेत हे माहीत असूनही त्यांना कळत कसे नाही? बायको, मुले, पैसा याविषयी इतकी प्रीती का असावी? ही माणसे कधी कुणाच्या उपयोगी पडू शकतात का? हे लोक त्यांना मिळालेला उत्तम नरजन्म वाया घालवीत आहेत. रामनामाचे चिंतन का करीत नाहीत? कित्येक लोक मरतात हे पाहिल्यावर आपल्यालाही मरायचे आहे हे जाणूनही लोकहो तुम्ही या वरपांगी देहाला का भुलता? काळाने त्याच्या बलिष्ठ वज्रपाषाने यांना बांधल्यावर हे काय करतील? गीतेमध्ये जन्म, मृत्यू, जरा, व्याधी, दुःख, व दोष यांचे जाणीवपूर्वक दर्शन करणे हे ज्ञानाचे लक्षण सांगितले आहे. संसारातील दुःखांची सतत जाणीव ठेवून हरी भजन करावे हेच महाराज आपल्यासारख्या मायाजालात फसलेल्या सामान्य जनतेला सांगत आहेत.
पुढील भागात याच संबंधी गाथेतील आणखी काही अभंगांचा परामर्श घेऊ.
अर्थ: भक्ती (प्रेमरूप भक्ति) एकच असूनही ती अकरा प्रकारे प्रकट होते. श्रीमहाराज एका ठिकाणी भक्ति बद्दल म्हणतात, “प्रपंचात जशी आसक्ति, तशी भगवंतावर प्रीती, त्या नाव भक्ति. “ प्रत्येक व्यक्ती स्वतंत्र असल्याने प्रत्येक व्यक्तीची आसक्ति कुठे असेल ते सांगणे कठीण आहे. म्हणून श्रीमहाराज म्हणतात त्याप्रमाणे मनुष्याने आपापल्या आसक्तीचा विचार करून, त्या आसक्तीला भगवंताकडे वळविता आले की त्याचे अर्धे काम झाले असे म्हणता येईल. श्रीमहाराज म्हणायचे की भगवंताशी काहीतरी नाते जोडावे. त्याला भाऊ, बहीण, आई, बाबा, पुत्र किंवा अन्य कोणतेही. त्याचा भक्तिमार्गात खूप उपयोग होतो.
आसक्तीचे प्रकार खालीलप्रमाणे आहेत:
गुण माहात्म्यासक्ति :
भगवंताचे गुण, महिमा, दया, करुणा, सौंदर्य, सामर्थ्य इ. श्रवण करून, मनन करून त्याच्यावर प्रेम करणे. नारद मुनी आणि महर्षी व्यास यांची भक्ति वरील प्रकारात मोडते.
रूपासक्ति :
भगवंताच्या सुंदर स्वरूपावर प्रेम करणे. त्याच्या मूर्तीचे, दर्शनाचे, सौंदर्याचे चिंतन करणे. गोकुळातील गोपींची भक्ति या प्रकारची आहे असे मानले जाते.
पूजासक्ति :
भगवंताची सेवा, पूजा, आरती, अभिषेक, अलंकार इत्यादींमध्ये प्रेम वाटणे.
स्मरणासक्ति :
सतत भगवंताचे नामस्मरण, गुणस्मरण, लीला चिंतन करणे हेच जीवनाचे ध्येय मानणे.
दास्यासक्ति :
आपण भगवंताचे सेवक आहोत, ही भूमिका घेत त्याची सेवा करणे.
सख्यासक्ति :
भगवंताशी मित्रभाव ठेवून त्याच्याशी मनमोकळा संवाद साधणे.
वात्सल्यासक्ति :
भगवंताच्या लीलांचे बालरूप धरून त्याच्यावर आई-वडिलांसारखे प्रेम करणे.
कान्तासक्ति :
भगवंतावर पतीप्रेमासारखे गाढ, उत्कट, अनन्य प्रेम करणे.
आत्मनिवेदनासक्ति :
स्वतःचे सर्वस्व भगवंताला अर्पण करणे. “तूच सर्वकाही आहेस, मी नाहीच” असे मनोधारणे.
तन्मयतासक्ति :
भगवंतात इतके एकरूप होणे की स्वतःचा विसर पडणे.
परमविरहासक्ति :
भगवंताच्या वियोगाने अतीव तगमग, विरह, वेदना याचा अनुभव घेणे.
समर्थ रामदास भक्तीचे नऊ प्रकार सांगतात.
भक्ती एकच असते ते भगवंतावरचे प्रेम. पण “व्यक्ती तितक्या प्रकृती” या उक्तीप्रमाणे भक्तीचे अनंत प्रकार होऊ शकतात.
“जशी भक्ताची भावना, तशी त्याची भक्तीची अभिव्यक्ती!”
जय जय रघुवीर समर्थ
– – – –
भक्ति सूत्रे ८३ – –
“इत्येवं वदन्ति जनजल्पनिर्भयाः एकमताः कुमार व्यास शुक शाण्डिल्य गर्ग विष्णु कौण्डिण्य शेषोद्धवारुणि बलि हनुमद् विभीषणादयो भक्त्याचार्याः ॥ ८३॥”
अर्थ : सनत्कुमार, वेदव्यास, शुकदेव, शाण्डिल्य, गर्ग, विष्णु, कौण्डिन्य, शेष, उद्धव, अरुणि, बलि, हनुमत्, विभीषण आदि भक्तीचे आचार्य लोकांच्या निंदा स्तुतीची पर्वा न करता (भीती न बाळगता) एकमताने असेच सांगतात की भक्तीच श्रेष्ठ आहे.
विवेचन : भक्तीमार्ग हा एक प्राचीन, समन्वयपूर्ण आणि अनुभवाधारित भगवंत प्राप्तीचा मार्ग आहे. इथे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की नारद मुनींनी ही सूत्रे लिहिली आहेत, ती त्यांच्या अनुभूतीची आहेत. भक्तीची रचना त्यांनी केलेली नाही, त्या आधीच्या ऋषि आणि पूर्वसुरींनी भक्तिशास्त्राची रचना केली. आणि ती परंपरेने आपल्यापर्यंत आलेली आहे. हा मागील कालावधी एका अर्थाने अनंत असा आहे. या भक्तिमार्गाचे काही प्रमुख आचार्य आहेत, त्यांची नावे वरती दिलेली आहेत. आपण या सर्वांना भक्तिमार्गाचे प्रमुख “वारकरी” (वाहक, प्रचारक) म्हणू शकतो. भक्तीच्या या पवित्र मार्गावर चालताना लोकांच्या टीकेची भीती न बाळगता भगवंताच्या प्रेमाला प्राधान्य देत निष्ठेने भक्ती करणे हे जीवनाचे सार आहे.
ज्या प्रमुख वारकऱ्यांचा उल्लेख नारद महर्षींनी केला आहे, त्यांची माहिती संक्षिप्त स्वरूपात आपण समजून घेऊ.
सनत्कुमार:
महाविष्णूंच्या आज्ञेने ब्रह्मदेवाने सृष्टि रचनेचा संकल्प केल्यावर प्रथम सनक, सनंदन, सनातन, सनातकुमार हे चार कुमार प्रकट झाले. हे नारद मुनींचे सद्गुरू. भक्तिशास्त्राच्या आचार्यांचे वर्णन करण्याआधी नारद महाराज आपल्या सद्गुरुंचे कृतज्ञता पूर्वक स्मरण करीत आहेत.
व्यास :
महर्षी नारद हे कीर्तन कलेचे उद्गाते आहेत, तसे वेदव्यास हे प्रवचन कलेचे उद्गाते मानले जातात. जिथे कीर्तन केले जाते त्याला नारदाची गादी म्हटले जाते तर जिथे प्रवचन केले जाते त्याला व्यासपीठ असे संबोधले जाते. व्यास हे एक महान ऋषी. त्यांनी अनेक ग्रंथाचे लेखन केलेज संपादन केले. त्यांनी महाभारतादि अनेक ग्रंथ लिहिले. पण इतके सारे लिहून त्यांना समाधान लाभले नाही. मग सद्गुरू नारद मुनींनी महर्षी व्यासांना भगवंताचे गुणवर्णन करणारे भागवत त्यांना लिहायला सांगितले. भागवत लिहिल्यावर त्यांना मनःशांती लाभली असे वर्णन आहे.
शुक :
व्यासांचे पुत्र, ते जन्मतःच वैराग्य संपन्न होते. श्रीमद्भागवताचे ते आद्य वक्ते मानले जातात. त्यांनी राजा परीक्षितीला भागवत सांगितले.
शाण्डिल्य :
शाण्डिल्य ऋषींची भक्तिसूत्रे प्रसिद्ध आहेत. नारद मुनींनी त्यांचा उल्लेख 18व्या सूत्रात केला आहे.
गर्ग :
कृष्णाचे नामकरण करणारे ऋषी. यांनी सुद्धा भक्ति सूत्रे लिहिली होती, पण काळाच्या पोटात ती गडप झाली असे म्हणावे लागते.
विष्णु :
हे एक महान ऋषी होऊन गेले. त्यांची अधिक माहिती उपलब्ध झाली नाही.
कौण्डिन्य :
धर्मराजाने अश्वमेध यज्ञ केला तेव्हा त्याचे प्रमुख कौडिन्य ऋषी होते असा उल्लेख आढळतो.
शेष :
क्षीरसागरात महाविष्णू शेषावर शयन करतात. लक्ष्मणाला शेषाचा अवतार मानले जाते.
उद्धव :
यादव कुळातील हा कृष्णाचा परमभक्त. गोपींनी त्याला भक्ति शिकवली.
आरुणि :
छादोंग्य उपनिषदात यांचा उल्लेख आहे.
बलि :
भक्त श्रेष्ठ प्रल्हाद यांचा मुलगा विरोचन यांचा हा मुलगा. हा महान भक्त होता. वामन अवतारात त्याला पाताळाचे राज्य भगवंताने त्याला देऊ केले.
हनुमान :
एका शब्दांत वर्णन करायचे झाल्यास ते असे करता येईल… रामदास (हनुमान).
बिभीषण : रावणाचा भाऊ. महान भक्त. रामभक्तीने चिरंजीव पद प्राप्त केले.
– – या सर्व महान भक्तांच्या चरित्राचे स्मरण करून प्रत्येकाने या पवित्र अशा भक्तिमार्गावर अनुसरण करायचा प्रयत्न करावा.
जय जय रघुवीर समर्थ
– – – – –
भक्ति सूत्रे ८४ – –
“य इदं नारदप्रोक्तं शिवानुशासनं विश्वसिति श्रद्धत्ते स प्रेष्ठं लभते स प्रेष्ठं लभत इति ॥ ८४॥”
अर्थ : जो मनुष्य नारदांनी सांगितलेली ही शिवमय, कल्याणकारक शिकवण (भक्तिमार्ग) श्रद्धेने व विश्वासाने स्वीकारतो, तो सर्वोत्तम असलेल्या भगवंताची प्राप्ती करतो.
विवेचन : भक्ति करणे जरी शास्त्र असले तरी भक्ति करायला सांगणे, सुचवणे हा उपदेश नव्हे.
भक्ति हे गुह्य ज्ञान आहे. ते सुलभ साध्य आहे, पण सहजसाध्य नाही. इथे वाचकांचा घोळ होऊ शकतो. निसर्गात हवा आहे आणि ती सर्वांना सुलभ आणि सहज साध्य आहे. पण भक्तीच्या बाबतीत थोडा वेगळा विषय आहे. भक्ति करण्यासाठी कोणतीही अट नाही, पण ती करावी लागते, त्यासाठी काही अथवा किमान नीतीनियम पाळावे लागतात. तसे हवेच्या बाबतीत म्हणता येत नाही. प्रयत्न केले, सांगितलेले नीती नियम पाळले तर भक्तीची प्राप्ती सुलभतेने होऊ शकेल.
“जितकी भक्ति तितकी प्राप्ति” हे सूत्र आपण पाहिले आहे. नारद महाराज स्वतः ठामपणे सांगतात की, जो भक्तीच्या या मार्गावर श्रद्धा ठेवतो, तो “प्रेष्ठं”( सर्वोत्तम गोष्ट) ईश्वरप्राप्ती करून घेऊ शकतो.
या जगात आपण नव्हतो, तेव्हा भगवंत होता. आज आपण आहोत, भगवंत आहे. उद्या कदाचित आपण नसू, पण भगवंत नक्कीच असेल. कारण न बदलणारा एकमेव भगवंत आहे. तो आपल्याच नव्हे तर चराचर सृष्टीच्या अंतर्यांमी तो स्थित आहे. त्याला जाणून घेणं हे मनुष्य जन्माचे खरे उद्दिष्ट आहे. आपल्याला नरदेह लाभला आहे तर त्याचा फायदा आपण करून घेतला पाहिजे. अन्यथा, आपण जन्ममरणाच्या चक्रात फसलेले आहोत, यातून बाहेर पडण्यासाठी भक्तिमार्गासारखा सुलभ मार्ग नाही.
महर्षी नारद ऋषींनी सामान्य मनुष्याचे दुःख दूर होण्यासाठी, नव्हे तर प्रत्येक मनुष्याला शाश्वत सुखाचा मार्ग मिळावा म्हणून ही परमप्रेमा भक्ति सांगितली आहे.
माझ्या सारख्या अल्पमती मंदबुद्धि असलेल्या मनुष्याने नारद भक्ति सूत्र विवेचनाचे शिवधनुष्य उचलण्याचे धाडस केले ते माझ्या सद्गुरूंच्या आधाराने. हे विवेचन करण्यात जी काही त्रुटी राहिली असेल ती माझी आहे आणि जे काही चांगले असेल तो मात्र माझ्या श्रीमहाराजांचा कृपाप्रसाद आहे अशी माझी श्रद्धा आहे. आपण हा कृपा प्रसाद गोड मानून घ्यावा आणि भक्तीमार्ग आचरावा.