मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ।। श्री नारद उवाच ।। – नारद भक्ति सूत्रे — सूत्र क्र. ७४, ७५, ७६. ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ☆

श्री संदीप रामचंद्र सुंकले

? इंद्रधनुष्य ?

।। श्री नारद उवाच ।। – नारद भक्ति सूत्रे — सूत्र क्र. ७४, ७५, ७६. ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले 

।। श्री नारद उवाच ।। 

भक्ति सूत्रे क्र. ७४ आणि ७५ – –

वादो नावलम्ब्य: ||७४||”

बाहुल्यावकाशादनियतत्वाच्च||७५||

अर्थ : भक्ताने वादाचा आश्रय घेऊ नये कारण वादामध्ये मतभिन्नतेला भरपूर वाव असतो आणि केवळ तर्कावर आधारलेले कोणतेही मत अथवा विधान अंतिम सत्य नसते. (म्हणून भक्ताने वादापासून दूर रहावे)

विवेचनजगाच्या प्रारंभापासून सांगणारे व ऐकणारे कोट्यावधी होऊन गेले आहेत, पण वाद विवाद काही मिटले नाहीत. पण ज्या वादांत संशयाचे ढग व वादाची वादळे एकामागे एक अशी असंख्य उठत असतात ते वाद निव्वळ दंभ वाढवितात. म्हणून भक्ताने त्यांच्या मागे न लागता सत्संगातील संवादसुख तेवढे घेत जावे.

सर्व संत सांगतात की वाद टाळावा. जर सर्वांशी चांगले संबंध ठेवायचे असतील तर वाद होण्याची परिस्थिती निर्माण होणारच नाही याकडे लक्ष द्यावे. “व्यक्ती तितक्या प्रकृती” तसेच “जितकी मने तितके विचार” हे सूत्र ध्यानी ठेवून तसे वागायला शिकावे. ज्या गोष्टी आपल्या नियंत्रणात नाहीत, त्या तिथल्या तिथे सोडून द्याव्या, तसेच पूर्व घटना आठवून त्याचा शोक करू नये. साधना करताना वाद विवाद टाळून सद्गुरुंच्या वचनावर पूर्ण विश्वास ठेवून साधन करीत राहावे, योग्यवेळी सद्गुरू खात्रीने कृपा करतात, हा विश्वास बाळगावा.

आपल्याकडे प्रत्येकाच्या घरी छोटेसे देवघर, देव्हारा किंवा एखादया देवाची प्रतिमा तरी नक्की असते. आपण रोज देवाची यथामती पूजा देखिल करतो. आपल्या घरात आपण कसे राहतो? कसे वागतो? आपल्या कुटुंबातील सर्वांशी आपले सबंध कसे असतात? हे सर्व पाहून देवाला आपल्या घरात राहावेसे वाटेल का? याचा गांभिर्याने विचार करण्याची गरज आहे. खरंतर, आपल्या घरात देव राहतो असे वाटण्यापेक्षा आपण देवाच्या घरात (मंदिरात) राहतो असे वाटले पाहिजे आणि आपण तसे वागले पाहिजे. हाच खरा सत्संग होईल.

आपल्याशी संवाद साधल्यामुळे समोरची व्यक्ती अंशत: तरी समृद्ध व्हावी.  किमान तसा आपला प्रयत्न असावा, असे झाले नाही तर आपण आपण निव्वळ वाचाळवीर ठरू. “बोले तैसा चाले…. ” असा आपला प्रयत्न असावा. नेमके आणि मोजके बोलणे हे सुसंवांद होण्यास उपयुक्त ठरते, नाही का? आपण तसे वागण्याचा प्रयत्न करू.

“तीर्थे तीर्थे निर्मलं ब्रह्मवृन्दं।

वृन्दे वृन्दे तत्त्वचिन्तानुवादः॥

वादे वादे जायते तत्त्वबोधः।

बोधे बोधे भासते चन्द्रचूडः॥”

“मतामतांचा गल्बला । कोणी पुसेना कोणाला । जो जे मतीं सांपडला । तयास तेंचि थोर ॥”

(दा. ११. ०२. २५)

दैनंदिन व्यवहार करताना अनेक विचारांची माणसे भेटतात. कधी एका विचाराच्या माणसांची चलती असते तर कधी दुसऱ्या… लोकं जातात पण विचार तिथेच रहातात. अर्थात दोन विचारांमधील वाद तसेच राहतात. अध्यात्मिक क्षेत्रात सुद्धा अनेक वाद (विचार) आहेत. द्वैत-अद्वैत हा तर प्रमुख वाद आहे. त्यानंतर शैव वैष्णव हा सुद्धा एक वाद आहे…. साधकाने या वादात फसू नये असे श्रीसमर्थ आपल्याला सांगतात. कुठे वाद घालायचा आणि तो कुठे थांबवायचा ह्याचे तारतम्य कळले नाही, तर संवाद न होता तो फक्त वाद होतो आणि वादातून काहीही निष्पन्न होत नाही, असे इतिहास सांगतो. अध्यात्म क्षेत्रात तरी मनुष्याने वादविवादाच्या भानगडीत न पडता सद्गुरू आज्ञेचे पालन करावे. एक गुरू आणि एक नाम, एक प्रमाण ग्रंथ इतक्या भांडवलावर मनुष्य आत्मारामाची प्राप्ती करून घेऊ शकतो.

संत्संग आपल्याला देवाकडे काय मागावे हे शिकवितो. म्हणून अर्जुन श्रीकृष्णाला मागतो आणि दुर्योधन श्रीकृष्णाचे सैन्य. आपल्याला नवीन काही शिकायचे असेल तर आपली पाटी कोरी हवी. आपण आपला अभिमान घेऊन देवाकडे गेलो तर देव सांगेल ते कधीच आपल्याला पटणार नाही. संवाद होणारच नाही मग हाती काय लागणार? म्हणून देवळात जाताना पायातील चप्पल आणि डोक्यावरील टोपी काढून जावे असे आपल्याला शिकविले जाते.

|| जय जय रघुवीर समर्थ ||

टीप : अधिक अभ्यास करायचा असल्यास मनाच्या खालील श्लोकांचा अभ्यास अवश्य करावा.

वरील दोन्ही सूत्रांचे सुलभीकरण करून आपल्यापुढे मांडण्याचे कार्य समर्थ रामदास स्वामींनी केले असल्याचे आपल्या लक्षात येईल. मनाच्या श्लोकांत ते म्हणतात,

मना सर्वदा सज्जनाचेनि योगें।

क्रिया पालटे भक्तिभावार्थ लागे॥

क्रियेवीण वाचाळता ते निवारी।

तुटे वाद संवाद तो हीतकारी॥१०८॥

*
जनीं वादवेवाद सोडूनि द्यावा।

जनीं वादसंवाद सूखे करावा॥

जगीं तोचि तो शोकसंतापहारी।

तुटे वाद संवाद तो हीतकारी॥१०९॥

*

तुटे वाद संवाद त्याते म्हणावें।

विवेके अहंभाव यातें जिणावें॥

अहंतागुणे वाद नाना विकारी।

तुटे वाद संवाद तो हीतकारी॥११०॥

*

हिताकारणे बोलणे सत्य आहे।

हिताकारणे सर्व शोधुनि पाहें॥

हितकारणे बंड पाखांड वारी।

तुटे वाद संवाद तो हीतकारी॥१११॥

*

जनीं सांगतां ऐकता जन्म गेला।

परी वादवेवाद तैसाचि ठेला॥

उठे संशयो वाद हा दंभधारी।

तुटे वाद संवाद तो हीतकारी॥११२॥

*

– – – – –   

भक्ति सूत्रे क्र. ७६ – – – 

भक्तिशास्त्राणि मननीयानि तदुद्बोधककर्माण्यपि करणीयानि||७६||

अर्थ : भक्तीविषयक शास्त्राचे मनन करावे आणि भक्तीला सहाय्यभूत होणारी कर्मे करावी.

विवेचन :

“विठ्ठल मात्रा जेणे घ्यावी | तेणे पथ्ये सांभाळावी” असे संत वचन आहे. भक्ति करताना मनुष्याने अधिकाधिक शुद्ध होण्याची अनिवार्यता असते. शुद्ध म्हणजे किती शुद्ध? तर जगात सर्वात शुद्ध आणि पवित्र कोण असेल तर तो एकमात्र भगवंत. त्याच्या इतके शुद्ध होण्यासाठी देहधारी साधकाची देहबुद्धी क्षीण होणे आवश्यक असते. एकदा सद्गुरू श्रीगोंदवलेकर महाराज यांनी आपल्या पट्टशिष्याला अर्थात ब्रम्हानंद बुवांना प्रश्न विचारला की तू तर विद्वान आहेस. वेद, वेदांत यांत पारंगत आहेस. मी कसा तुझा गुरू झालो? आणि नंतर स्वतःच म्हणाले की कदाचित तुझ्यापेक्षा मी कणभर जास्त देहाला विसरलो असेन….! कथेतील भावार्थ इतकाच की देहबुद्धि क्षीण नव्हे, तर पूर्णपणे नष्ट होणे ही साधकाच्या भक्तीचे प्रमाण मानता येईल.

आता ही देहबुद्धि समूळ नष्ट होण्यासाठी आवश्यक त्या आणि तितक्याच शास्त्रांचा किंवा ग्रंथांचा अभ्यास साधकाने करावा. अन्यथा साधक साधक न रहाता शास्त्री होतो आणि पुन्हा कर्मठपणाचा दोष त्याच्या अंगी निर्माण होऊन तो पथभ्रष्ट होऊ शकतो.

श्रीमहाराज म्हणायचे की फार वाचू नये. जितके वाचावे तितके साधकाने आधी आचरणात आणावे, अन्यथा मी इतके इतके ग्रंथ वाचले, इतक्या शास्त्रांचा अभ्यास केला याचा वृथा अभिमान बळावू शकतो.

भक्ति शास्त्र म्हणून समजून घेण्यासाठी एखाद्या ग्रंथाचा अभ्यास करण्यास हरकत नाही. आजपर्यंत अनेक संत महात्मे होऊन गेले. त्यांनी त्यांच्या अनुभवातून अनेक ग्रंथांची निर्मिती केली. त्या सर्वांचे ग्रंथ अभ्यास करायचा म्हटले तर अनेक जन्म घ्यावे लागतील आणि मूळ हेतू मात्र विसरला जाईल. यावर सर्व संतांनी एक उपाय सांगितला. एक गुरू, एक ग्रंथ आणि एक नाम. या तिघांच्या सहाय्याने मनुष्य भगवतांची प्राप्ती करून घेऊ शकतो.

साधकाने आपले प्रत्येक कर्म अशा पद्धतीने करावे की जेणेकरून त्यातून भक्तीची वाढ होईल.

भक्तीच्या अनेक व्याख्या आहेत. त्यातील आपल्याला झेपेल अशी व्याख्या प्रमाण मानावी. मला भावलेल्या दोन व्याख्या इथे देत आहे.

१. “जे जे भेटे भूत। ते ते मानिजे भगवंत।।” (ज्ञाने. 10. 18)

२. प्रपंचात जेवढी आसक्ती | तेवढी भगवंतावर प्रीती || याचे नाव भक्ति”

साधकाने आपल्याला भावणारा ग्रंथ निवडावा आणि त्याचा साक्षेपाने अभ्यास करावा, त्यावर चिंतन, मनन करावे, म्हणजे त्याला पुढील मार्ग आपसूक दिसू लागेल.

जय जय रघुवीर समर्थ

नारद महाराज की जय!!!

– क्रमशः भक्तीसूत्रे – ७४, ७५, ७६..

© श्री संदीप रामचंद्र सुंकले (दास चैतन्य)

थळ, अलिबाग. 

८३८००१९६७६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “बाया” – कवी : विजय जोशी  ☆ प्रस्तुती – मंजुषा सुनीत मुळे ☆

मंजुषा सुनीत मुळे

📚 वाचताना वेचलेले 📖

☆ “बाया” – कवी : विजय जोशी ☆ प्रस्तुती – मंजुषा सुनीत मुळे ☆

बाया कपडे धुवायला जातात,

नदीवर निगुतीने!

 

सुख दुःखे बुचकळवतात पाण्यात,

आणि बोलतात वाहत्या पाण्याशी,

सराईतपणे मनमोकळं….

कपडे घासतात, आपटतात,

धोपटतात दगडावर,

साफ करतात कपड्यांचा मळ, आणि मनातली खळबळ सुद्धा!

 

बायका कुजबुजतात, पुटपुटतात, बडबडतात,

आपापसात,

मनाशी,

कपड्यांशी,

पाण्याशी,

दगडांशीसुद्धा.

 

विरघळून जातो सारा शीण,

नदीतल्या पाण्यात, आणि,

बाया फिरतात माघारी,

पुन्हा एका नवीन दिवसाची सुरुवात करायला,

नदीच्या पात्रात विस्तीर्ण आणि

स्वच्छ नितळ मनाने!

कवी : विजय जोशी

प्रस्तुती : मंजुषा सुनीत मुळे 

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈ 

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ विजय साहित्य # २९१ – गुरू माऊली…! ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆

कविराज विजय यशवंत सातपुते

? कवितेचा उत्सव # २९१ – विजय साहित्य ?

☆ गुरू माऊली …!

=१= 

 पुस्तक माझी गुरू माऊली

ज्ञान शलाका,देई साऊली.

मुळाक्षरांनी, भरली पाटी

शब्द शारदा, प्रसाद वाटी.

 

=२=

गुरु माऊली, ग्रंथ कोंदणी

ज्ञान संपदा, शब्द गोंदणी.

भावमनीचे, आहे स्पंदन

मनामनांचे, दैवी मंथन.

=३=

ग्रंथगुरू हेहोय सारथी ,

घडवी ज्ञानी, नवीन पिढी

पुस्तक पेढी, उंची ठरवी

ध्येय पथाची, सुखद शिडी.

 =४=

ज्ञानलालसा, नि ज्ञानार्जन

अक्षरधन हे, मनी जपू

पुस्तक पेढी, सगुण शारदा,

तिन्ही त्रिकाळी तिजसी नमू

 =५=

अक्षरलेणी, अक्षरगाथा,

सरस्वतीच्या, चरणी माथा

पुस्तक पेढी, हवी संग्रही

ज्ञानदायीनी, अक्षर गाथा…!

© कविराज विजय यशवंत सातपुते

सहकारनगर नंबर दोन, दशभुजा गणपती रोड, पुणे.  411 009.

मोबाईल  8530234892/ 9371319798.

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेच्या उत्सव ☆ कोठे शोधू… ☆ सौ. जयश्री पाटील ☆

सौ. जयश्री पाटील

 

? कवितेच्या उत्सव ?

कोठे शोधू… ☆ सौ. जयश्री पाटील ☆

(वृत्त – पतितपावन 8-8-8-2)

 

रमून गेले कशी सहज मी नवीन संसारी

जशी विरघळे साखर दुधात तशी पडल्यावरी

 *

वाटे ना मज परके कोणी मला ना सासरी

जुळली नाती अशी जशी की जन्मजन्मांतरी

 *

दीर सासरे नणंद सासू गोकुळ भरलेले

येती जाती सगे सोयरे अंगण फुललेले

 *

शेतीवाडी जमीन जुमला अमाप दुध दुभते

माणुसकीच्या आपुलकीच्या शब्दांना भरते

 *

अडी नडीला येती सारे समजून आपुले

गावाकऱ्यांचे भांडण तंटे इथे किती सुटले

 *

आता कोठे शोधू वाडा ती गाय वासरे

काळ बदलला गाव हरवला उडाली पाखरे

  

© सौ. जयश्री पाटील

विजयनगर.सांगली.

मो.नं.:-8275592044

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ मला समजलेली संत तुकारामांची गाथा… भाग – १७ ☆ सुश्री अरुणा मुल्हेरकर ☆

सुश्री अरुणा मुल्हेरकर

? विविधा ?

☆ मला समजलेली संत तुकारामांची गाथा… भाग – १७ ☆ सुश्री अरुणा मुल्हेरकर ☆

सत्संग-सज्जन प्रशंसा

परमेश्वर प्राप्तीसाठी नामस्मरण, भक्ती, सेवाभाव याबरोबरच सत्संग या गोष्टीला तितकेच महत्त्व दिल्याचे आपल्याला गाथेतील  अभंगांतून दिसून येते. उच्च समजल्या जाणाऱ्या ब्राह्मण वर्गातील काही  मंडळींकडून तुकाराम महाराजांना अतिशय त्रास दिला जात होता. आम्ही वेद पंडित, शास्त्राचा अभ्यास केलेले, म्हणून आम्हीच अध्यात्माचे जाणकार असे समजून जे समाजातील खालच्या वर्गाचे समजणाऱ्या लोकांना फार पीडा देत असत अशा पाखंडी वर्गावर तुकाराम महाराजांनी त्यांच्या अभंगातून चांगलेच ताशेरे मारले आहेत.

ब्राह्मण असो की वैश्य असो अथवा शूद्र, संत सज्जन कोणाला म्हणावे हे सांगताना तुकाराम महाराज म्हणतात,

हिरा ठेविता ऐरणी/ वाचे मारिता जो घणी /

 तोची मोल यावे खरा/ करणीचा होय चुरा//

 मोहरा तोची अंगे/ सूत न जळे ज्याचे संगे/

 तुका म्हणे तोचि संत/ सोसो जगाचे आघात//

संत कसे असतात तर, जो हिरा ऐरणीवर ठेवून मोठ्या हातोड्याने त्याच्यावर घाव घातला तरी फुटत नाही. तोच हिरा

मौल्यवान आहे दुसरे इतर बनावट काचेचे तुकडे असतात कारण ते घाव घालताच त्यांचा चुरा होतो. ज्याला सूत गुंडाळून अग्नीत टाकले असता सूत जळत नाही तोच खरा मोहरा होय. त्याचप्रमाणे जो जगाने दिलेले सर्व प्रकारचे उपद्रव शांतपणे सहन करतो त्याला संत म्हणावे.

ते संतांचा महिमा वर्णन करतात.

 सकळ चिंतामणी शरीर/ जरी जाय अहंकार समूळ आशा/

 निंदा हिंसा नाही कपट देह बुद्धी/ निर्मळ स्फटिक जसा.//

 मोक्षाचे तीर्थ न लगे वाराणसी/ येती तया पासी अवघे जन//

 तीर्थासी तीर्थ झाला तोची एक/ मोक्ष तेणे दर्शने//

 मन शुद्ध तया काय करीसी माळा/

 मंडित सकळा भूषणासी//

 हरीच्या गुणे गर्जताती सदा/

 आनंद तया मानसी//

 तन मन धन दिले पुरुषोत्तम/ आशा नाही कवणाची//

 तुका म्हणे तो परीसाहुनी आगळा/

 काय महिमा वर्णू त्याचा//

या अभंगात तुकारामांनी संतांची लक्षणे सांगितली आहेत. चित्त शुद्ध असलेल्या संतांबद्दल तुकाराम महाराज गौरवाने बोलत आहेत की ज्याचा अहंकार गेला  आहे, निंदा, हिंसा, कपट, देह बुद्धी याचा वास त्यांच्यात नाही तोच स्फटिकासारखा निर्मळ आहे, त्याचे सर्व शरीर चिंतामणीच आहे. मोक्ष देणारे तीर्थ काशी, तिची त्याला जरुरी नाही. कारण सर्व तीर्थांना पावन करणारा संत हाच तीर्थस्थान झालेला आहे. सर्व जग अशा पुरुषापाशीच येते. याच्या दर्शनानेच मोक्षाचा लाभ होतो. ज्याचे मन शुद्ध झाले आहे त्याला जपमाळेसारख्या बाह्य चिन्हांची काहीही जरुरी राहिलेली नाही. मन शुद्ध असल्यानेच तो सर्व भूषणांनी मंडित झालेला आहे. जे हरीचे गुणगान करत असतात ते निरंतर आनंदातच असतात.त्यांनी स्वतःला पुरुषोत्तमाच्या ठायी अर्पण केले आहे आणि जो कोणावरही आशा ठेवत नाही तो परिसापेक्षाही श्रेष्ठ आहे. त्याचा महिमा शब्दात वर्णन करता येत नाही. संतांच्या दर्शनाने तापत्रयांचा नाश होऊन विश्रांती मिळते.

 

 शुद्ध बीजापोटी/ फळे रसाळ गोमटी/

 मुखी अमृताची वाणी/ देह देवाचे करणी//

 सर्वांग निर्मळ/ चित्त जैसे गंगाजळ/

 तुका म्हणे जाती/ ताप दर्शनी विश्रांती

 

बीज शुद्ध असले की त्यातून उगवणारी फळे रसाळ आणि गोडच असतात, असं सांगून संत तुकाराम पुढे म्हणतात की ज्याच्या मुखात अमृततुल्य गोड शब्द आहेत आणि ज्याचा देह देवकार्यासाठी वापरला जात आहे, ज्याचे चित्त गंगाजळाप्रमाणे पवित्र आहे त्याच्या दर्शनाने त्रिविध ताप हरण होऊन चित्ताला विश्रांती मिळते.

 सोनियाचे ताट क्षीरीने भरिले/

 भक्षावया दिले श्वानालागी//

 मुक्ताफळ हार खराशी घातला/

 कस्तुरी सुकराला चोजविली//*

 वेद पारायण बधिरा सांगे ज्ञान/

 तयाची ते खूण काय जाणे//

 तुका म्हणे ज्याचे तोची एक जाणे/

 भक्तीचे महिमान साधू जाणे//

एक संत साधूच असा आहे की जो भक्तीचा महिमा जाणतो. सामान्यांना हे पटवून देण्यासाठी तुकाराम महाराज या अभंगात रोजच्या जीवनातील काही उदाहरणे देतात.

सोन्याच्या पात्रात खीर भरून ती कुत्र्याला दिली तर त्याचा काय उपयोग? त्याचप्रमाणे गाढवाच्या गळ्यात मोत्याचा हार घातला किंवा डुकराच्या नाकाला कस्तुरी लावली

तर त्याचा महिमा त्यांना कळणार आहे का? एखाद्या बहिर्‍याला(अज्ञानी) माणसाला वेदाचे ज्ञान कितीही देण्याचा प्रयत्न केला तरी ते त्याच्या बुद्धीला समजणार आहे का? जे खरे वर्म आहे ते ज्याचा तोच जाणू शकतो. याच कारणास्तव संतांची संगती धरावी असे तुकाराम महाराजांचे सांगणे आहे.

तुकाराम महाराजांना वैष्णवांचे दास होण्याची तळमळ लागली आहे. कारण ते म्हणतात.

 ते माझे सोयरे सज्जन सांगाती/

 पाय आठवीती विठोबाचे//

 येरा मानविधी पाळणा पुरते/

 देवाची ती भुते म्हणोनिया//

 सर्व भावे जालो वैष्णवांचा दास/

 करीन त्यांची आस उच्छिष्ठाची//

 तुका म्हणे जैसे आवडती हरिदास/

 तैसी नाही आस आणिकांची//

तुकाराम महाराजांच्या मनात हरिदासांविषयी अत्यंत आदर आहे. जे पांडुरंगाच्या चरणांचे चिंतन करतात ते सज्जन माझे सोयरे आहेत असे ते म्हणतात.

बाकीच्यांना मी फक्त विधीपालनापुरते आदराने वागवतो कारण सर्व भूतमात्र देवाच्याच रूपाचे असतात. काया, वाचा, मनाने मात्र तुकाराम महाराज वैष्णवांचे दास आहेत. त्यांच्या उच्छिष्टाची महाराज आशा धरतात. त्यांना हरिदास जितके आवडतात तितके इतर कोणीही आवडत नाही. या अभंगात पर्यायाने सज्जनांची संगती चांगली हे सांगण्याचा महाराजांचा आटोकाट प्रयत्न आहे.

संतांची महती सांगणारा हा आणखी एक अभंग आपण पाहूया.

 काय वाणू आता न पुरे हे वाणी/

 मस्तक चरणी ठेवीतसे//

संत महात्म्य वर्णन करताना महाराजांची वाणी अपुरी पडते. त्यांच्या चरणावर मस्तक ठेवून ते म्हणतात,

 थोरीव सांडली आपुली परिसे/

 नेणे सिवो कैसे लोखंडासी//

 जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती/

 देह कष्टविति पर उपकारे//

 भुतांची दया हे भांडवल संता/

 आपुली ममता नाही देही//

 तुका म्हणे सुख पराविया सुखे/

 अमृत हे मुखे स्त्रवतसे//

लोखंड अति हीन आहे, त्याला मी कसा स्पर्श करू? असे मनात न आणता परीस त्याचे सोने करतो, त्याचप्रमाणे संतांनी माझ्या सारख्या हीनाचा स्वीकार केला आहे. संतांचे अवतार जगाच्या कल्याणा करताच असतात, ते आपला देह परोपकार करण्यासाठी कष्टवितात. सर्वांवर दया करणे, हे संतांचे स्वाभाविक भांडवल आहे व त्यांना स्वतःच्या देहाची ममता नसते.

ते संत लोकांच्या सुखामुळेच सुखी होतात आणि त्यांचे बोलणे अमृता सारखे मधुर असते. हरीच्या नामामृताचा ओघच त्यांच्या वाणी वाटे वाहत असतो.

पुढील भागात सज्जन प्रशंसे विषयी आणखी काही अभंगांचा आपण विचार करू.

क्रमशः… १६ 

© सुश्री अरुणा मुल्हेरकर 

डेट्राॅईट (मिशिगन) यू.एस्.ए.

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ।। श्री नारद उवाच ।। – नारद भक्ति सूत्रे —सूत्र ७०, ७१, ७२, ७३. ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ☆

श्री संदीप रामचंद्र सुंकले

? इंद्रधनुष्य ?

।। श्री नारद उवाच ।। – नारद भक्ति सूत्रे — सूत्र ७०, ७१, ७२, ७३. ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले 

।। श्री नारद उवाच ।। 

नारद भक्ति सूत्रे ७० – – 

तन्मया : ||७०||

 अर्थ : भक्त भगवंतमय झालेले असतात.

विवेचन: विभक्त नाही तो भक्त अशी भक्ताची व्याख्या केली जाते. इथे तन्मय असा उल्लेख आहे. साधना पूर्णत्वास गेली की भक्त आणि भगवंत यांच्यात काही भेद रहात नाही. अशा साधकाचे वर्णन भगवंत गीतेत करतात.

*”नाही तृष्णा भय क्रोध माझ्या सेवेत तन्मय|*

*झाले ज्ञान-तपे चोख अनेक मज पावले||”*

(गीताई ०४. १०)

संताना ना कोणापासून भय असते, तर कोणासाठी त्यांच्या मनात क्रोध असतो. त्यांच्या मनात फक्त त्या भगवंताबद्दल निरतिशय प्रेम असते. जणू भगवंतच त्यांच्या ह्रदयात विराजमान असतो. आपल्याला हनुमानाची गोष्ट ठाऊक आहे. वेळ आल्यावर हनुमानाने आपली छाती विदीर्ण करून राम आपल्या हृदयात असल्याचे दाखवून दिले होते. अशी सर्व मंडळी ही सामान्य साधकांसाठी भक्तीचे आदर्श आहेत, प्रमाण आहेत.

प्रभू श्रीरामाला हनुमंताला बक्षिस देण्याकरता एकही गोष्ट योग्य वाटली नाही. शेवटी त्याने हनुमंताला आलिंगन दिले आणि त्याचे कौतुक पुढील शब्दांत केले आहे.

रघुपति कीन्ही बहुत बड़ाई। तुम मम प्रिय भरतहि सम भाई।”

संत तुकाराम महाराज म्हणतात की साधना करता करता अशी वेळ आली की मला आता विठ्ठल माझा सोयरा वाटू लागला आहे. सोयरा अर्थात अगदी जवळचा.

ते एका अभंगात म्हणतात,

*”विठ्ठल सोयरा सज्जन सांगाती । विठ्ठल या चित्तीं बैसलासे ॥१॥ विठ्ठलें हें अंग व्यापिली ते काया । विठ्ठल हे छाया माझी मज ॥२॥ बैसला विठ्ठल जिव्हेचिया माथां । न वदे अन्यथा आन दुजें ॥३॥ सकळां इंद्रियां मन हे प्रधान । तें ही करी ध्यान विठोबाचें ॥४॥” तुका म्हणे या हो विठ्ठलासी आतां । नये विसंबतां माझें मज ॥५॥”*

(अभंग क्रमांक 497, सार्थ तुकाराम गाथा धार्मिक प्रकाशन संस्था)

 जय जय रघुवीर समर्थ

—–

भक्ति सूत्रे क्र. ७१ – 

*”मोदन्ते पितरो नृत्यन्ति देवताः सनाथा चेयं भूर्भवति ||७१||”*

अर्थसिद्ध भक्ताच्या माता, पिता व पूर्वजांना आनंद होतो. देव देवता आनंदाने नृत्य करतात आणि पृथ्वीला रक्षणकर्ता मिळून ती सनाथ होते.  

विवेचनदैनंदिन व्यवहारात एखादा मनुष्य जर श्रीमंत झाला, मोठा उद्योगपती झाला तर त्याचे कूळ तर उद्धरतेच, तसेच त्याच्या कर्तृत्वामुळे अनेक लोकांना रोजगार मिळत असतो.

परमार्थातील अंतिम पायरी म्हणजे भक्त आणि भगवंताचे एकरूप होणे. असे पूर्णत्व प्राप्त करणारे तसे मोजकेच असतात, पण ते असतात यात काही शंका नाही. भारतमातेच्या अशी अनेक नररत्ने जन्मास आली की ज्यांनी भगवंताची प्राप्ती करून घेतील आणि ही परंपरा अखंड राहील यात शंका असण्याचे कारण नाही.

एक गोष्ट आपण इथे लक्षात घेतली पाहिजे की जेव्हा एखाद्या जडजीवाला नरदेह प्राप्त होतो, तेव्हा भगवंताला सर्वात जास्त आनंद होतो कारण त्याला वाटते की आता मी याला नरदेह दिला आहे, तर आता हा साधना करून माझी (अर्थात भगवंताची) प्राप्ती करून घेईल, पण प्रत्यक्षात मात्र लाखो करोडो मध्ये एखादा जीव देवत्वापर्यंत पोचतो. मग ज्याप्रमाणे ऑलिंपिक पदक मिळविल्यावर ज्याप्रमाणे त्या देशातील सर्वांना आपल्या घरी दसऱ्याच्या दिवशी दिवाळी आल्यासारखे वाटतेज तसे साधकाच्या नातेवाईकांना, घरच्या लोकांना, पितरांना नव्हे तर देवदेवतांना ही तितकाच उत्कट आनंद होतो असे नारद मुनी आपल्याला सांगत आहेत.

अशा साधकाचे वर्णन संत तुकाराम महाराज आपल्या पुढील अभंगात करतात… 

*”निर्वैर होणें साधनाचें मूळ । येर ते विल्हाळ सांडीमांडी ॥१॥ नाहीं चालों येत सोंगसंपादणी । निवडे अवसानीं शुद्धाशुद्ध ॥२॥ त्यागा नांव तरी निर्वीषयवासना । कार्‍या कारणां पुरता विधि ॥३॥ तुका म्हणे राहे चिंतनीं आवडी । येणें नांवें जोडी सत्यत्वेंसी ॥४॥”*

साधकाच्या अंतरात देवत्व प्रगट झाले की तो सिद्ध होतो. देहाने मनुष्य दिसत असला तरी तो भगवंत झालेला असतो. बाहेरून त्या संताचा व्यवहार कदाचित अतिसामान्य असेल, पण अंतरात मात्र त्याचे अनुसंधान पक्के असते.

त्याच्या नजरेत सर्वजण समान असतात. ते अवतरण करतात, ते आपल्या सारख्या सामान्य जनांचा उद्धार करण्यासाठी. पूज्य ब्रम्हानंद महाराज म्हणायचे की दोन रुपयाचे तिकीट काढले की गोंदवले येथे सगुण ब्रह्म पाहायला मिळायचे. अशा संतांमुळे पृथ्वीवरील पाप नष्ट होते, पृथ्वी सनाथ होते.

जय जय रघुवीर समर्थ

—–

भक्ति सूत्रे क्र. ७२, ७३ – – 

 *”नास्ति तेषु जाति विद्यारूपकुलधनक्रियादि भेदः ॥७२॥”*

*”यतस्तदीय: ||७३||”*

अर्थश्रेष्ठ भक्तांमध्ये जातपात, विद्या (शिक्षण), रूप, कुळ, पैसा, करत असलेले काम इत्यादींवर आधारलेले भेद नसतात, कारण ते भगवतांचे एकनिष्ठ भक्त असतात.  

विवेचनही दोन्ही एकमेकांस साधारण पुरक आहेत म्हणून त्यांचे विवेचन एकत्र करीत आहे.  

भक्ति करणे म्हणजे भगवंतावर अकारण प्रेम करणे हे आपण पाहिले आहे. दैनंदिन व्यवहार करताना मनुष्याला कधी जाणता तर कधी अजाणता मनुष्याला विविध प्रकारचे भेद पाळावे लागतात, अन्यथा त्याला व्यवहार करता येत नाही. उदा. वाहन कोणतेही असले तरी त्या वाहनाला ठेवण्यासाठी वाहनतळच उचित ठरते. वाहन महागडे आहे म्हणून कोणी त्याला झोपण्याच्या खोलीत नेऊन ठेवत नाही, अर्थात ते उचितही नसते.

संत अर्थात पूर्णत्व पावलेला भक्त हा स्वतः देव झालेला असतो. संत कधीही कोणामध्ये भेद पाळत नाहीत, भेद मानीत नाहीत.  

आपल्याला सर्वांना ज्ञात असलेले एक गीत आहे. — – 

*”टाळ बोले चिपळीला नाच माझ्या संगं*

*देवाजीच्या दारी आज रंगला अभंग ॥धृ॥*

*दरबारी आले रंक आणि राव*

*सारे एकरूप नाही भेदभाव*

*गाऊ नाचू सारे होऊनी नि:संग||||”*

 या स्थितीला संत पोहचलेले असतात. कोणत्याही संताच्या स्थानी जावं, तिथे आपल्याला मुक्त प्रवेश मिळेल.

संतत्व प्राप्त केलेला मनुष्य व्यवहारातील भेद लक्षात घेऊन त्या त्या माणसांशी, त्या त्या प्राण्यांशी त्या त्या परीने वर्तन करतात.

श्रीगोंदवलेकर महाराजांच्या चरित्रात अशी अनेक उदा. आहेत. त्यातील एक दोन मी इथे सांगतो. एकदा चोरी करायला आलेल्या चोरांना श्रीमहाराजांनी पकडले. त्यांना पोलिसात न देता, पुन्हा चोरी करणार नाही या अटीवर त्यांना अनुग्रह देऊन कृपांकित केले. एका मनुष्य त्यांच्यावर विष प्रयोग करण्यासाठी आला होता. आपल्याला मारायला आलेल्या मनुष्याला सुद्धा श्रीमहाराजांनी अनुग्रह देण्याची तयारी केली होती. पण तो मनुष्य घाबरून पळून गेला. तेव्हा श्रीमहाराज म्हणून गेले, की त्याने चांगली संधी सोडली आणि स्वतःचे नुकसान करून घेतले. इतके दयासिंधुत्व संतच दाखवू शकतात. कारण स्वतः परमात्मा त्यांच्या अंतर्यामी कायम स्थित असतो.

प्रकृतीचे स्वतःचे असे विधिविधान आहे. त्यानुसार घटना घडत असतात. अमुक वेळेस पाऊस पडणार किंवा ऊन पडणार हे प्रकृतीच्या अधीन आहे. अनेक सामान्य माणसांना प्रश्न पडतो की संत अवतार घेतात, तर लोकांचे दुःख, दैन्य दूर का करीत नाहीत? या प्रश्नांची अनेक उत्तरे आजपर्यंत आपण पाहिली असतील, पण पुढील उत्तर मला अधिक उचित वाटते.

एकदा श्री रमण महर्षी यांना एकाने प्रश्न विचारला की तुम्ही आपल्या शक्तीचा इतरांच्यापी कल्याणासाठी उपयोग का करीत नाही? तर त्यावेळी रमण म्हणाले की आम्ही दोन कुठे आहोत, आम्ही एकच आहोत. अर्थात मीच परमात्मा आहे आणि मीच सर्व काही करीत आहे. त्यामुळे अनेक वेळा अनेक लोकांचा गोंधळ होऊ शकतो.

साधक जेव्हा सिद्ध होतो, तो गुरू स्वरूप होऊन जातो. तो जगदाकार होऊन जातो. एकदा श्रीमहाराजांना एका भक्ताने विचारले की आमच्या अनेक प्रश्नांचे तुम्ही इतक्या त्वरेने कसे उत्तर देऊ शकता? त्यावर श्रीमहाराज म्हणाले की मला तुमचा प्रश्न आधीच कळलेला असतो. जेव्हा तुमच्या मनात प्रश्न निर्माण होतो

तेव्हाच तो मला कळतो आणि जेव्हा तुम्ही येऊन मला प्रश्न विचारता, तोपर्यंत उत्तर शोधायला मला अवधी मिळतो. मग मी त्याचे उत्तर देऊ शकतो. अर्थात श्रीमहाराज आपल्या मनात उपस्थित असतात, नव्हे ते कायम आपल्या मनात असतात, असे म्हणता येईल. भगवंताची एक उपाधी मन अशीच आहे, नाही का?

*”जेथे नाम, तेथे माझा प्राण | ही सांभाळावी खुण ||”*

– – श्री गोंदवलेकर महाराज

भक्तीच्या पहिल्या पायरीवर भक्त देवाला म्हणत असतो की *तस्य एव अहम्*.

अर्थात त्याचे रूप, गुणवर्णन ऐकले आहे, पण प्रत्यक्षात तो कसा आहे हे माहित नाही. पण तो मला आवडतो.

भक्तीच्या दुसऱ्या पायरीवर भक्त देवाला म्हणतो की *तव एव अहम्*.

अर्थात भक्त भगवंताच्या सान्निध्यात असतो. भगवंत भक्ताच्या सोबतीला असतो. *”जेथे जातो तेथे तू माझा सांगाती”* अशी भक्ताची खात्री असते.

भक्तीच्या तिसऱ्या पायरीवर भक्त आणि देव एकच होत असतात. *”मी तू पणाची झाली बोळवण, एका जनार्दनी श्रीदत्त ध्यानची* अशी स्थिती असते. देव आणि भक्त एकमेकाला म्हणतात, *त्वम् एव अहम्*. ही तदियतेची स्थिती म्हणता येईल.

यापुढील स्थितीमध्ये भक्त देवाला म्हणतो भक्तीचे सुख भोगण्यासाठी मला भक्तच राहू दे नि तू भगवंत रहा.  

संत तुकाराम महाराज या स्थितीचे वर्णन पुढील प्रमाणे करतात.

*”नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव | मी भक्त तू देव ऐसे करी ॥१॥ दावी रूप मज गोपिका-रमणा | ठेवीन चरणावरी माथा ॥२॥ पाहोनि श्रीमुख देईन आळिंगन | जिवे लिंबलोण उतरीन ॥३॥ पुसता सांगेन हितगुज मात | बैसोनि एकांत सुख गोष्टी || || तुका म्हणे यासी न लावी उशीर | माझे अभ्यंकर जाणोनीया ॥५॥”*

संदर्भ : अभंग क्रमांक २२७८, सार्थ तुकाराम गाथा धार्मिक प्रकाशन संस्था

 जय जय रघुवीर समर्थ

नारद महाराज की जय!!!

– क्रमशः भक्तीसूत्रे – ७०, ७१, ७२, ७३.

© श्री संदीप रामचंद्र सुंकले (दास चैतन्य)थळ, अलिबाग. 

८३८००१९६७६

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ इप्सित… ☆ श्री अनिल वामोरकर ☆

श्री अनिल वामोरकर

? कवितेचा उत्सव ?

☆ इप्सित… ☆ श्री अनिल वामोरकर ☆

 येतो फिरून

मर्त्यलोकी

चक्र हे अनादी

जाण बा…

 

साधनेत रत

येते नाम ओठी

अंतीम क्षणी

तिचि गती…

 

वाटते त्वा

येणे जाणे खुंटावे

म्हणोन प्रभूला स्मरावे

श्वासागणिक…

 

करिता यत्ने

होशील एकरुप

इप्सित फलद्रूप

पावे परमधाम…

© श्री अनिल वामोरकर

अमरावती

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ सीतामुडी किती निराळी… ☆ रेणुका धनंजय मार्डीकर ☆

रेणुका धनंजय मार्डीकर

?️?  चित्रकाव्य  ?️?

? सीतामुडी किती निराळी… ? रेणुका धनंजय मार्डीकर ☆

सरसर पाऊस येताना 

झरझरती रेशीम धारा

आंबा फणसावर फुलतो 

मनमोही सुखद नजारा

लतिकेने वृक्षावरती 

गजराच माळला भासे

सीतावेणी लडिवाळे

जणू हळूच खुदकन हासे 

 *

 गुलबिल्या अंगाची ही 

 श्वेतांगीशी फुलवंती 

 गजऱ्यात हिच्या रुपाची

 किती लाभलीच श्रीमंती

 *

आमरी म्हणती हिज कोणी

सीतामुडी किती निराळी

पानसकोळी ही सुंदर 

कोकणात हिची झळाळी

 *

द्रौपदी माला सजलेली

गजऱ्यात फुले ही शंभर

चिमणी श्वेतांगी सुमने

जांभूळली त्यावर झालर

 *

किती भाग्यच या वेणीचे

प्रेमाचे प्रतिक झाली

कुंतली माळता तिजला

मग नवी झळाळी ल्याली

 *

किती सुगंध गोजिरवाणा

मन माझे पिंगा घाली

शब्दांची फुलपाखरणी

कविता जन्माला आली

© रेणुका धनंजय मार्डीकर

औसा.

मोबा. नं.  ८८५५९१७९१८

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ – मनमुक्त मी – ☆ सुश्री ज्योत्स्ना तानवडे ☆

सुश्री ज्योत्स्ना तानवडे

?️?  चित्रकाव्य  ?️?

 

? – मनमुक्त मी…! – ☆ सुश्री ज्योत्स्ना तानवडे ☆

सुख स्वप्नांचे रंग मी

अंगावर पांघरले 

फुलपाखरांचे थवे 

सभोवती अवतरले ||

*

स्वप्नांची फुलपाखरे 

मनी रुंजी घालतात 

मनावरती हलकेच 

मोरपीस फिरवतात ||

*

आनंदी घराची मी 

सिद्धहस्त स्वामिनी 

गृहसौख्य फुलविणारी 

गृहदेवता भामिनी ||

*

मी सौंदर्याची राणी 

आत्मानंदात रमते 

माझे आत्मतत्त्व मी 

मनमुक्ततेत जपते ||

*

मी देवाची निर्मिती 

मी निर्मितीची खाण 

सुख स्वप्नात सुद्धा 

नसे कशाची वाण ||

© सौ.ज्योत्स्ना तानवडे

वारजे, पुणे.५८

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मराठी कविता ☆ कवितेच्या प्रदेशात # ३११ ☆ पानगळ… ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

सुश्री प्रभा सोनवणे

? कवितेच्या प्रदेशात # ३११ ?

पानगळ ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

आता सुरुच झाली ऐकलेली पानगळ

कित्येक दिवसांची रोखलेली पानगळ

 *

हिर्वा ऋतू आला अंगणाच्या आतही

दिसली जरा उशिरा सांडलेली पानगळ

 *

 तो एकटा तीही एकटी या जीवनी

कोणास सांगे हे बेतलेली पानगळ

 *

 होतास तू तेव्हा कोणत्या रूपात रे

देवा तुझ्या दारी योजलेली पानगळ

 *

पानगळ होताना सावल्यांनो शांत व्हा

पाहून घ्या आता झोपलेली पानगळ

© प्रभा सोनवणे

संपर्क – “सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार

पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011

मोबाईल-९२७०७२९५०३,  email- sonawane.prabha@gmail.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares