श्री संदीप सुंकले (दास चैतन्य)
मनमंजुषेतून
☆ मनामनातील वेताळ… लेख क्र. ९ ☆ श्री संदीप सुंकले (दास चैतन्य) ☆
रंग…
रंग. रंग मनुष्याच्या आयुष्यात ok खूप महत्वाची भूमिका बजावतात…! कोणतीही वस्तू विकत घेताना, निवडताना, भेट देताना, स्वीकारताना इतर बाबींसोबत त्या वस्तूचा रंग अवश्य पाहतो…! रंगाच्या बाबतीत प्रत्येक माणसाची विशिष्ट अशी आवडनिवड असते, असू शकते…!
काही रंग मनाला शांती देणारे असतात, तर काही रंग मनुष्याला नकोसे असतात…
बऱ्याच लोकांना विशिष्ट रंगाच्या वस्तूच नव्हे, तर व्यक्तीही आवडत नाहीत. अनेक लोकांना मनुष्याच्या सावळ्या (खरंतर काळया…) रंगाचे वावडे असते…
या वावड्या स्वभावाचा कधीकधी अतिरेकी नमुना पाहण्यात येतो…! एखाद्या गोऱ्या रंगाच्या मनुष्याच्या बाजूला एखादा काळा मनुष्य बसला तर त्याला असे वाटते की याचा काळा रंग आपल्या अंगाला लागणार तर नाही ना?
इथेच हे थांबत नाही…
एक जुने मराठी गाणे आठवले…
काळाही म्हणतो गोरी पाहिजे,
गोरा ही म्हणतो गोरी
आता तुम्हीचं सांगा पावण
कुठे जातील काळ्या पोरी…
एक गाणे म्हणजे समाजमनाचे प्रतिबिंब आहे असे म्हणता येईल…
एका आईबापाच्या पोटी जन्माला आलेल्या मुलांचे रंग (शरीराचा वर्ण) भिन्न भिन्न असल्याचे आपण पाहतो…
पण, गोरा म्हणजे चांगला आणि काळा म्हणजे वाईट असे अंधविश्वासू समीकरण आपल्या मनात मांडतो आणि मनुष्य त्यानुसार आचरण करतो…
हा वेताळ नव्हे काय?
आपण सर्वजण एकाच आईची लेकरे आहोत, असे मनावर बिंबवून पक्के केले तर मनामनात लपलेला वेताळ बाहेर काढून टाकायला हवा…
मनुष्य महत्वाचा की त्याचा रंग महत्त्वाचा याचा निर्णय करता आला तर या वेताळाला पळवून लावणे शक्य होईल.
पटतंय ना?
मानवी जीवन प्रवासात रंगांचे अनन्यसाधारण महत्त्व आहे असे आपल्या लक्षात येईल. किंचितशी अतिशयोक्ती करून असे म्हणता येईल की रंग आहेत म्हणून आयुष्य रंगीबेरंगी आहे, रंग नसते तर आयुष्य बेरंगी झालं असतं…
हेच सूत्र भगवंतांच्या, ही चराचर सृष्टी निर्माण करणाऱ्याच्या मनात असावे म्हणून त्याने एकाच रंगाची किंवा एकाच प्रकारची माणसे निर्माण केली नाहीत… (त्याने एकाच रंगाचं आणि गंधाचे तसेच एकाच आकाराचे साबण बनवणारा कारखाना काढलेला नाही…)
त्याने त्याच्या कार्यकौशल्याप्रमाणे काही ठिकाणी एकदम गोरी, काही ठिकाणी निमगोरी, काही ठिकाणी सावळी, काही ठिकाणी लख्ख काळी अशी विविध प्रकारची माणसं निर्माण केली…
हे वर्णन वाचताना खूप छान वाटत, नाही का?
पण प्रत्यक्षात…
प्रत्येकाला गोरे व्हायचे आहे, प्रत्येकाला अधिक गोरे व्हायचे आहे…
सध्या मनुष्याला गोरे करणारी अनेक मलमे बाजारात विकत मिळत आहेत… (अर्थात अशी मलमे लावून फक्त जाहिरातीत दाखवलेली महिला गोरी होत असते, प्रत्यक्षात तसे गोरे कोणीही होत नसते…)
एकेकाळी पांढरी पूड लावून मनुष्य तात्पुरता गोरा व्हायचा आणि त्यात समाधान मानायचा, पण आता काळ बदलला, तशी अनेक शोध लावले गेले…
आता ठिक्कर काळा मनुष्य देखील कृत्रिम रित्या काही काळापुरता गोरा होऊ शकतो…
गोरे होणे वाईट आहे असे बिल्कुल नाही, पण विधात्याने सर्व गोष्टींचा विचार करून आपल्याला उचित असा रंग दिला आहे तो न स्वीकारता, त्याने निगुतीने केलेल्या एखाद्या रचनेत मनुष्याने ढवळाढवळ केल्यासारखे होणार नाही का? या कृत्रिम रित्या गोरे होण्याचा हव्यास म्हणजे एक प्रकारचा
वेताळच नव्हे काय?
ह्या वेताळामुळे मनुष्य गोरा होतो की नाही ते सांगणे अवघड आहे, पण दोन गोष्टी नक्की होतात. एक म्हणजे त्या मनुष्याचा न्यूनगंड वाढतो आणि अशी विशिष्ट मलमे विकणाऱ्या कारखान्यांची भरभराट खात्रीने होते…
पटतंय का?
आपण वेळीच या वेताळाला आवर घालायला हवा…
– लेख क्र. ९
© श्री संदीप सुंकले (दासचैतन्य)
मो. 8380019676
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर


















