वरील कविता लिहिण्याचे मुख्य कारण म्हणजे, आपल्या सर्वांसाठीच असलेला बिकट करोना काळ मुख्यत्वे कारणीभूत आहे. त्या वेळी आलेला श्रावण महिना हा खूपच वेगळा, असुरक्षित आणि भीतीदायक होता.
लहानपणापासून जो आनंद श्रावण महिन्यात अनुभवला होता त्याची आठवण तेव्हा अगदी बेचैन करत होती. त्या बालपणीच्या आठवणींमुळेच ह्या कवितेचा जन्म झाला.
ही कविता लिहिणे म्हणजे थोडक्यात बालपणीच्या आठवणींना उजाळा देणे आणि प्रत्यक्ष नाही परंतु कवितेच्या माध्यमातून स्वतः आणि आप्तजनांना ह्या पवित्र महिन्याचा अनुभव घडवणे हाच एक उद्देश्य होता.
☆ फुलपाखरे… कवी : श्रीशैल चौगुले – रसग्रहण : अविनाश शिंदे ☆ प्रस्तुती – श्रीशैल चौगुले ☆
☆
☆ फुलपाखरे ☆
☆
इवली पिवळी फुलपाखरे
पिवळ्याशा दगडफुलांवर
सुंदर बागडती ईथे-तिथे
वारा ओला झेलीत दलांवर.
*
पाती गवताची दवात मस्त
कधी वनात भ्रमण अनेक
ओहोळकाठी माळरानी कधी
मोहित मना फसवी अनेक.
*
स्पर्श होता भिरभिरती भारी
रंग हाताला लावून उडती
पुन्हा बेभान पाठलाग त्यांचा
गवसणेचा हेतु ना घडती.
*
भाव अंतरी असेच जीवनी
स्वप्नांच्या हृदयी फुलपाखरे
एकही न मनासारखे यश
रंग स्मृतींचे ते हरे-भरे.
श्रीशैल चौगुले.
श्रीशैल चौगुले यांची ‘फुलपाखरे’ ही कविता अत्यंत निसर्गरम्य, संवेदनशील आणि मानवी भावनांची सखोल उकल करणारी एक अप्रतिम रचना आहे.
कवितेच्या पहिल्याच कडव्यात पिवळ्या दगडफुलांवर बागडणारी पिवळी फुलपाखरे आणि ओला वारा झेलणारी त्यांची नाजूक पंखे यांचे अतिशय जीवंत आणि दृश्यमान चित्र उभे राहते. शब्दांमधून निसर्गाचा ताजेपणा स्पष्टपणे जाणवतो.
‘ओहोळकाठी’, ‘माळरानात’, ‘दवात मस्त गवताची पाती’ यांसारख्या शब्दांमुळे कवितेला एक निसर्गदत्त सौंदर्य प्राप्त झाले आहे. फुलपाखरांचा मागोवा घेताना मनाची होणारी मोहिनी आणि भ्रमंती कवीने खूप सुंदर टिपली आहे.
फुलपाखराला स्पर्श करताच ते हाताला रंग लावून भिरभिरत उडून जाणे आणि त्याच्या मागे बेभान होऊन धावणे… हा बालपणीचा किंवा मानवी स्वभावाचा नित्याचा अनुभव कवीने अतिशय साध्या पण प्रभावी शब्दांत मांडला आहे.
कवितेचा शेवट या रचनेला एका वेगळ्याच उंचीवर घेऊन जातो. केवळ निसर्गाचे वर्णन न राहता, कवीने फुलपाखरांची तुलना माणसाच्या ‘स्वप्नांशी’ आणि ‘इच्छांशी’ केली आहे. आयुष्यात मनासारखे यश पकडू पाहताना ते फुलपाखरासारखे निसटून जाते, पण हातात किंवा आठवणींत मात्र त्याचे ‘रंग’ कायम राहतात, हा तत्त्वज्ञानाचा धागा अतिशय अर्थपूर्ण व भावुक करणारा आहे.
थोडक्यात सांगायचे तर –
ही कविता बाह्य निसर्गाच्या सौंदर्यातून मानवी आयुष्यातील स्वप्न आणि सत्याचा सुंदर मेळ घालते. कवीची कल्पकता, लयबद्धता आणि भावोत्कटता कौतुकास्पद आहे.
रसास्वाद: अविनाश शिंदे
प्रस्तुती: श्रीशैल चौगुले
≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /मंजुषा मुळे/गौरी गाडेकर≈
☆ मनाचे श्लोक – एक सार्वकालिक ‘मनोपनिषद’… – श्लोक ९७ आणि ९८ ☆ श्री विश्वास देशपांडे ☆
श्लोक क्र. ९७ – – –
मुखी नाम नाही तया मुक्ती कैंची ।
अहंतागुणे यातना ते फुकाची ।
पुढे अंत येईल तो दैन्यवाणा ।
म्हणोनि म्हणा रे म्हणा देवराणा ।।९७।।
अर्थ :ज्याच्या मुखी भगवंताचे नाम येत नाही त्याला मुक्ती कशी मिळणार? कर्तेपणाच्या अहंकारातून माणसाला विनाकारण यातना भोगाव्या लागतात. शेवटी मृत्यू येतो तो सुद्धा अत्यंत करुणाजनक. म्हणून सर्वानी भगवंताचे नाम घ्यायलाच हवे.
विवेचन : आयुष्यभर भगवंताचे नाम घ्यायचे नाही, भक्ती करायची नाही आणि अंतकाळी भगवंताने आपल्याला मुक्ती द्यावी अशी अपेक्षा करायची. पण काही केलेच नाही तर मुक्ती मिळेल कशी? मुक्तीची अशी अपेक्षा करणे म्हणजे शेतात धान्य पेरण्याचे श्रम करायचे नाहीत आणि आयते धान्य किंवा पीक आपल्या घरात येईल अशी अपेक्षा करण्यासारखेच आहे. आपल्याला आपल्या कर्तेपणाचा भयंकर अभिमान असतो. मी हे केले, मी ते केले. माझ्यामुळेच सगळे होते आहे असा अभिमान मनुष्य बाळगतो. पण शेवटी एक दिवस हा कर्तेपणाचा फुगा फुटतो. वृद्धापकाळी मुले, सुना विचारत नाहीत तेव्हा मनात निराशा घर करते. मी आयुष्यभर एवढे कष्ट केले, मुलांना शिकवून मोठे केले, त्यांचे लग्न केले. पण एवढे असूनही ते माझ्याकडे लक्ष देत नाहीत. आपण दुर्लक्षित आहोत ही भावना सर्वात जास्त अस्वस्थ करणारी असते.
गोंदवलेकर महाराज म्हणतात, ” देहाने कर्म करा, पण कर्तेपण स्वतःकडे घेऊ नका. कर्ता राम आहे असे म्हणा. ” आपले चुकते ते इथेच. आपण कर्तेपण रामाकडे देत नाही. म्हणून आपल्याला अपेक्षाभंगाचे दुःख भोगावे लागते. त्याशिवाय कर्तेपणाच्या धुंदीत भगवंताचे नाम घेतो कोण? निदान निवृत्त झाल्यावर तरी भगवन्नामात रमण्याची सवय लावून घ्यावी. ही सवय लागली तर संसाराचा मोह हळूहळू कमी होतो, आसक्ती कमी होऊ लागते. अशा परिस्थितीत मृत्यू आला तरी तो सुखाचा होतो. पण ही सवय नसेल तर मृत्यूप्रसंगी देखील संसारातील आसक्ती कमी होत नाही. जो मनुष्य नाम घेत नाही त्याचा अंत दीनवाणा होतो. म्हणून समर्थ म्हणतात प्रत्येकाने देवाचे नाव घ्यावेच घ्यावे. समर्थ आपल्या एका अभंगात म्हणतात, ” काळ जातो क्षणक्षणा । मूळ येईल मरणा । काही धावाधाव करी । जंव तो काळ आहे दूरी ।।”
स्वसंवाद ::
१. माझ्या कुटुंबासाठी किंवा व्यवसायासाठी केलेल्या कष्टांमध्ये मी ‘मी केले’ हा कर्तेपणाचा अहंकार बाळगून विनाकारण मानसिक यातना तर ओढवून घेत नाहीये ना?
२. गोंदवलेकर महाराजांनी सांगितल्याप्रमाणे, मी माझे कर्तव्य चोख पार पाडताना “या सगळ्याचा कर्ता-धर्ता तो प्रभू श्रीराम आहे” हा भाव मनात ठेवू शकतो का?
३. “मी मुलांसाठी एवढे केले तरी ते मला विचारत नाहीत” या विवंचनेत जगण्याऐवजी, मी आतापासूनच भगवंताच्या नामात रमून संसाराची आसक्ती कमी करण्याचा प्रयत्न करतोय का?
४. समर्थांच्या म्हणण्याप्रमाणे जर काळ क्षणोक्षणी पुढे जात आहे आणि मृत्यू अटळ आहे, तर मग माझ्या उद्धारासाठी ‘देवराणा’ श्रीरामाचे नाव घेण्यास मी अजून उशीर का करत आहे?
=====
श्लोक क्र. ९८ – – –
हरीनाम नेमस्त पाषाण तारी ।
बहु तारिले मानवदेहधारी ।
तया रामनामीं सदा जो विकल्पी ।
वदेना कदा जीव तो पापरूपी ।।९८।।
अर्थ :भगवंताच्या नामाने खरोखर पाषाणही तरले आहेत. रामनामाने अनेक माणसे तरून गेली आहेत. पण काही माणसांच्या मनात रामनामाबद्दल नेहमी विकल्प म्हणजे संशय असतो. असे जीव म्हणजे खरोखर पापी समजावे की ज्यांच्या मुखात रामनाम येत नाही.
विवेचन :रामनामाचे महत्व वर्णन करताना समर्थ म्हणतात की रामनामाने खरोखरीच पाषाण देखील तरले. पाषाण म्हणजे दगड. बुडणे हाच त्याचा धर्म आहे. जो त्याचा संग करील त्याला देखील तो घेऊन बुडतो. परंतु रामनामाची महती एवढी आहे की पाषाणाच्या या मूळ स्वभावात देखील अंतर्बाह्य बदल झाला. पाण्यात बुडणारा पाषाण चक्क रामनामामुळे पाण्यावर तरंगू लागला. या ठिकाणी रामायणातील सेतुबंधनाचा संदर्भ आहे. श्रीरामांना लंकेला जाण्यासाठी समुद्र उल्लंघून जायचे होते. पण जायचे कसे हा मोठा प्रश्न होता. अशा वेळी वानर सेनेतील नल, नील, जांबुवंत आणि हनुमान यांच्या साहाय्याने हा सेतू बांधण्यात आला. अर्थात यात प्रत्येकाचीच मदत झाली. अगदी खारीची देखील! रामनाम लिहिलेले दगड सागरावर तरंगू लागले आणि पाहता पाहता चक्क समुद्रावर पूल तयार झाला. हा पूल पार करून रामाची सेना लंकेला पोचली.
दगड हे रूपक आहे. या संसारसागरात ज्याने रामनामाचा आश्रय घेतला नाही असा मनुष्य देखील पाषाणासमानच आहे. पण जर तो रामनामाचा आश्रय घेईल तर या भवसागरातून तो निश्चितपणे तरून जाईल यात शंका नाही. रामनामाने तयार झालेला हा पूल माणसाला भवसागर पार करण्यासाठी मदत करेल आणि त्याच्या मदतीने तो निश्चितपणे परमेश्वरापर्यंत पोहोचेल यात शंका नाही. ‘ नाम आहे आदी अंती, नाम सर्व सार, आहे बुडत्याला नौका ठेवली आधार ‘ हे अगदी खरे आहे. म्हणून आपले सर्व कर्म नाममय झाले पाहिजे.
परंतु एवढे उदाहरण डोळ्यासमोर असूनही माणसाच्या मनात रामनामाबद्दल शंका असतात. खरेच रामनामात एवढे सामर्थ्य आहे का? नुसते रामनाम मला तारील का? असा माणूस नाम घेण्याचे टाळतो. रामनामाचे विस्मरण होणे हे पाप आहे. पण माणसाची देहबुद्धी अत्यंत प्रबळ असते. बाह्य दृश्यात त्याचे मन रमलेले असते. त्याची दृष्टी अंतराकडे म्हणजे आतमध्ये वळत नाही. अंतरात्म्याला तो जाणून घेऊ इच्छित नाही. अशा माणसाला वेद, पुराणे, शास्त्रे किंवा संतांनी कितीही समजावून सांगितले तरी त्याची खात्री पटत नाही. अशा माणसांच्या मुखी भगवंताचे नाम येत नाही. भगवंताचे नाम मुखी यायला देखील भाग्य लागते. पूर्व जन्मीच्या पापामुळे अशा व्यक्तींना भगवंताचे नाम घेण्याची बुद्धी होत नाही. पण ज्यांना कळते आहे त्यांनी तरी रामनाम अवश्य घ्यावे. कोणाच्या सांगण्याची वाट पाहू नये.
स्वसंवाद ::
१. ज्याप्रमाणे रामनामाने समुद्रावरील जड पाषाणही तरंगले, त्याप्रमाणे माझ्या मनातील संसाराचे जड विचार आणि चिंता दूर करण्यासाठी मी रामनामाची नौका धरली आहे का?
२. “नुसते नाम घेऊन काय होणार? ” अशा कुठल्यातरी ‘विकल्पाने’ (संशयाने) माझे मन घेरलेले आहे का? हा संशय दूर करण्यासाठी मी कधी नाम घेऊन अनुभव पाहीला आहे का?
३. सेतुबंधनातील खारीप्रमाणे, मी माझ्या आयुष्यात परमेश्वराच्या कार्यात किंवा सत्कर्मात माझा खारीचा वाटा उचलण्यास तयार असतो का?
४. माझी दृष्टी केवळ बाह्य दृश्य विश्वातील आकर्षणांमध्येच गुंतून पडली आहे, की मी माझ्या अंतरात्म्याला जाणून घेण्यासाठी कधी अंतर्मुख होतो?
☆ मनाचे श्लोक – एक सार्वकालिक ‘मनोपनिषद’… – श्लोक ९५ आणि ९६ ☆ श्री विश्वास देशपांडे ☆
श्लोक क्र. ९५ – – –
अजामेळ पापी वदे पुत्रकामे ।
तया मुक्ति नारायणाचेनि नामे ।
शुकाकारणे कुंटणी राम वाणी ।
मुखे बोलता ख्याति झाली पुराणी ।।९५।।
अर्थ :दुराचारी असलेल्या अजामेळाने अंतकाळी आपल्या नारायण पुत्राचे नाव घेतले. त्या मुलाचे सतत नाम घेतल्याने त्याला मुक्ती मिळाली. एका गणिकेने ‘ राम राम ‘ हे आपल्या पोपटाचे नाम सतत घेतल्याने तिचा देखील उद्धार झाला. आपल्या अंतकाळी भगवंताचे नाम घेणाऱ्या व्यक्तींच्या या कथा पुराणात प्रसिद्ध झाल्या.
(शुक – पोपट, कुंटणी – गणिका/वेश्या)
विवेचन : भगवंताच्या नामाचे महत्व पटवून देण्यासाठी समर्थ या श्लोकात पुराणातील दोन वेगळी उदाहरणे आपल्या देतात. अजामेळ ब्राह्मणाची कथा भागवतात आली आहे. अजामेळ हा दुराचारी होता. आपल्या आयुष्यात त्याने कधी भगवंताचे नाम घेतले नाही. आपला अंतकाळ जेव्हा जवळ आला तेव्हा त्याला आपल्या लाडक्या नारायण या पुत्राची आठवण होऊन तो त्याच्या नावाचा जप करू लागला. तेव्हा विष्णुदूतांनी येऊन त्याला मुक्ती दिली अशी कथा आहे. दुसरी कथा आहे पिंगला या गणिकेची. तिने देखील आपल्या संपूर्ण आयुष्यात परमेश्वराची भक्ती केली नाही. परमेश्वराबद्दल तिला एक प्रकारचा तिरस्कार होता असे म्हटले तरी चालेल. त्याच भावनेतून तिने आपल्या आवडत्या पोपटाचे नाव ‘राम ‘ असे ठेवले. अजाणतेपणी का होईना पण त्यानिमित्ताने ती रामनाम घेत गेली. त्यामुळे तिचा उद्धार झाला. खरी गोष्ट अशी आहे या सगळ्यांना मृत्यूसमयी आपल्या चुकीचा पश्चाताप होऊन त्यांनी भगवंताचे नाम घ्यायला सुरुवात केली. पुढे त्यातूनच त्यांचा उद्धार झाला.
तर्कशास्त्राच्या कसोटीवर या कथा आजच्या काळात टिकणाऱ्या नाहीत. नास्तिक आणि बुद्धिवादी लोक तर या पुराणातील भाकडकथा आहेत म्हणून सहज उडवून लावतील. पण समर्थांच्या काळात या कथा प्रचलित होत्या. लोकांनी परमेश्वराचे नाम कोणत्याही प्रकारे का होईना पण घ्यावे आणि त्यांना रामनामाचे महत्व पटावे एवढाच समर्थांचा या कथा सांगण्यामागील उद्देश असावा. आपणही तो उद्देश लक्षात घेऊ या. आपल्यासाठी त्या कथांपेक्षा समर्थांचा संदेश महत्वाचा आहे. ज्याप्रमाणे आपण धान्य निवडताना आपण फोलपट टाकून देऊन सार आपल्याकडे ठेवतो त्याप्रमाणे बाकी निरुपयोगी फोलपट टाकून सार तेवढे ग्रहण करू या. रामनाम हेच सार आहे. सुज्ञास अधिक सांगणे नलगे.
स्वसंवाद ::
१. पुराणातील कथांमधील चमत्कारिक गोष्टींवर तर्क लढवत बसण्यापेक्षा, त्यामागे संतांनी दिलेला ‘नामस्मरणाचा’ मूळ संदेश (सार) मी स्वीकारू शकतो का?
२. “अजाणतेपणी किंवा मुलाच्या ओढीने घेतलेले नाम जर अजामेळाला तारू शकते, ” तर मग मी जाणीवपूर्वक आणि मनापासून नाम घेतले तर माझ्या आयुष्यात किती सकारात्मक बदल घडू शकेल?
३. संसाराच्या वेगवेगळ्या विवंचनेत अडकलेला असतानाही, मी माझ्या रोजच्या बोलण्यात किंवा व्यवहारात भगवंताच्या नामाचे अधिष्ठान ठेवतो का?
४. संतांनी सांगितल्याप्रमाणे, “रामनाम हेच अंतिम सार आहे” हे स्वीकारून मी मनातील निरर्थक शंकांचे ‘फोलपट’ टाकून द्यायला तयार आहे का?
=====
श्लोक क्र. ९६ – – –
महाभक्त प्रल्हाद हा दैत्यकूळी ।
जपे रामनामावळी नित्यकाळी ।
पिता पापरूपी तया देखवेना ।
जनीं दैत्य तो नाम मूखे म्हणेना ।।९६।।
अर्थ :भगवंताचा महान भक्त असलेला प्रल्हाद याचा जन्म दैत्यकुळात झाला. परंतु तो नित्य भगवंताच्या नामाचा जप करीत असे. अत्यंत पापी असलेला त्याचा पिता हिरण्यकश्यपू याला ते पाहवेना. त्याने आपल्या आयुष्यात कधीही नामस्मरण केले नाही.
विवेचन :
भगवंताच्या नामाचे महत्व पटवून देण्यासाठी समर्थ आपल्याला प्रत्येक श्लोकात वेगवेगळी उदाहरणे देत आहेत. एखाद्या कुशल शिक्षकाने ज्याप्रमाणे विविध उदाहरणे देऊन आपल्या विद्यार्थ्यांना समजावून सांगावे तसे समर्थ आपल्याला सांगत आहेत. या अर्थाने समर्थ हे लोकशिक्षक आहेत. जन उद्धाराची तळमळ त्यांना आहे. ‘बुडते हे जन न देखवे डोळा ‘ या भावनेतून ते आपल्याला रामनामाचे महत्व सांगत आहेत.
प्रल्हाद हा विष्णूचा महान भक्त होता. पण त्याचा जन्म एका दैत्यकुळात झाला होता. दैत्यकुळातील मंडळी म्हणजे साधारणपणे भगवंताला विरोध करणारी किंवा त्याला आपला शत्रू मानणारी होती. अशा प्रतिकूल ठिकाणी प्रल्हादाचा जन्म झाला. पण भगवद्भक्तीचे संस्कार प्रल्हादाला गर्भातूनच मिळाले होते. त्याची आई कयाधू ही गर्भारपणी महर्षी नारदांच्या आश्रमात राहिली होती. तिथेच भगवद्भक्तीचे संस्कार प्रल्हादावर झाले.
प्रल्हादाला आपल्या घरातील परिस्थिती भगवंताचे नामस्मरण करण्यासाठी अनुकूल नव्हती. पण भगवंताचा खरा भक्त होण्यासाठी जे गुण लागतात, त्या गुणांनी तो परिपूर्ण होता. त्याच्या मुखात भगवंताचे नाम अखंड येत असे. ‘ ओम नमो भगवते वासुदेवाय ‘ या मंत्राचा नित्य जप तो करीत असे. इथे आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की प्रल्हाद नारायणाचे म्हणजे विष्णूचे नाम जपत होता. पण वरील श्लोकात समर्थांनी ‘ जपे रामनामावळी ‘ असे म्हटले आहे. नारायण असो की राम, तो सर्वव्यापी ईश्वर एकच आहे हेच समर्थ या श्लोकातून आपल्याला दाखवून देतात. त्यामुळे आपण देखील भगवंताच्या नामात भेदभाव करणे योग्य नाही.
परमेश्वराला आपला शत्रू मानणाऱ्या हिरण्यकश्यपूला अर्थातच हे आवडणे शक्य नव्हते. हिरण्यकश्यपू हा भगवान शंकराचा भक्त होता. त्याने कठोर तपश्चर्या करून शंकरांकडून असा वर मागून घेतला होता की ज्या वरामुळे त्याला सहजासहजी कोणी मारू शकत नव्हते. त्यामुळे तो स्वतःला अमर समजू लागला. आणखीनच उन्मत्त झाला. प्रजेवर आणि भगवंताच्या भक्तांवर जुलूम करू लागला. पण आपला स्वतःचाच मुलगा आपले ऐकत नाही असे पाहिल्यावर त्याने प्रल्हादाला मारण्यासाठी कोणतीही कसूर बाकी ठेवली नाही. पण प्रल्हादाची भगवंतावर अविचल श्रद्धा होती. भगवंताने हर प्रकारे त्याचे सर्व संकटातून रक्षण केले. हिरण्यकश्यपू पापी असला तरी प्रल्हादासारखे भगवंतावर अविचल निष्ठा असणारे पुत्ररत्न त्याच्या उदरी जन्मले हे त्याचे केवढे भाग्य! त्यामुळेच आपल्या अंत्यसमयी हिरण्यकश्यपूला नरसिंहरूपाने भगवंताचे दर्शन झाले आणि त्याला मुक्ती मिळाली.
प्रल्हादाचा जन्म जरी दैत्यकुळात झाला तरी इच्छा असली तरी विपरीत परिस्थितीत देखील भगवंताचे नाम घेऊन तरून जाता येते हेच समर्थ या श्लोकातून आपल्याला सांगतात. आपणही प्रल्हादाप्रमाणे भगवंताचे नाम घेऊन या भवसागरातुन तरून आपला उद्धार करून घेऊ शकतो. तो आपल्याला सर्व संकटातून सोडवेल.
स्वसंवाद ::
१. माझ्या सभोवतालची परिस्थिती किंवा घरचे वातावरण परमार्थ साधण्यासाठी अनुकूल नाही, असे रडत न बसता मी प्रल्हादासारखा ‘अविचल’ राहून नामस्मरण करू शकतो का?
२. राम, कृष्ण, विष्णू किंवा शिव यांच्यामध्ये श्रेष्ठ-कनिष्ठ असा भेद करून मी माझ्या मनाची ऊर्जा वाया घालवतो आहे, की सर्वव्यापी ईश्वर एकच आहे हे सत्य स्वीकारतो?
३. हिरण्यकश्यपूप्रमाणे मीही उन्मत्त होऊन माझ्या जवळच्या माणसांवर किंवा सत्प्रवृत्तींवर अन्याय तर करत नाहीये ना?