आपण IIT-IIM च्या डिग्रीला “इंटेलिजन्स” म्हणतो, पण जी बाई रोज सकाळी 6 ते रात्री 10 पर्यंत किचन नावाची कंपनी CEO सारखी चालवते, तिच्या IQ चं सर्टिफिकेट कोण देणार?
तू सांगितलेले 8 विषय + माझ्याकडून 2 एक्स्ट्रा:
विषय: किचनमध्ये काय होते? बाहेरच्या जगात काय म्हणतात?
गणित: “4 लोकांसाठी 2 वाटी डाळ, पण सासूबाई आल्या तर 2. 5” Resource Planning, Demand Forecasting
भौतिकशास्त्र: तेलाचा “तडतड” आवाज ऐकून तापमान कळणं Thermodynamics + Acoustics
रसायनशास्त्र : दही लावताना ‘ऊब’ बरोबर लागली का? Bio-chemistry + Fermentation Tech
मॅनेजमेंट: गॅसवर डाळ, कुकरमध्ये भात, तव्यावर पोळी, मनात उद्याचा स्वयंपाक Parallel Processing + Time Management
बोनस 1: Nutrition: ताप आल्यावर पेज, पावसाळ्यात गरम सूप, परीक्षेला दूध-बदाम Dietician + Preventive Healthcare
बोनस 2: Diplomacy: सासूला कमी तिखट, नवऱ्याला जास्त तिखट – एकाच भाजीत 2 चव Stakeholder Management
3 गोष्टी ज्या कुठल्याही MBA मध्ये शिकवत नाहीत:
“उरलं-सुरलं” ची कला: रात्रीची पोळी → सकाळचा कुस्करा. भात उरला → दुसऱ्या दिवशी फोडणीचा भात. Waste = 0%. हे आहे Circular Economyचा बेस्ट नमुना.
“मूड डिटेक्टर”: घरात कोणी उपाशी झोपलं तर तिला झोप लागत नाही. ती कॅलरी मोजत नाही, चेहऱ्यावरचं समाधान मोजते.
“अदृश्य ओव्हरटाइम”: ऑफिसमध्ये 9-5 नंतर OT चे पैसे मिळतात. किचनमध्ये रात्री 11 ला मुलाला भूक लागली तर बिनपगारी एक्स्ट्रा शिफ्ट. तरी तक्रार नाही.
म्हणूनच रावणाच्या सोन्याच्या लंकेपेक्षा आईच्या हातच्या वरण-भाताची किंमत जास्त.
तू आधी पाठवलेल्या “Silent Kitchen” मेसेजचा पुढचा भाग हा आहे. अमेरिका किचन विसरली, म्हणजे तिने “डिग्रीशिवायच्या CEO”ला रिटायर केलं. परिणाम: कुटुंब तुटलं.
जपान आजही जगात सर्वात जास्त जगतो कारण तिथे “ओफुकुरो नो अजी” = आईच्या हातची चव ही सांस्कृतिक संपत्ती मानली जाते.
आज काय करायचं? 3 मिनिटांचं “थँक यू किचन” प्रोटोकॉल:
☆ स्फटिक… लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे☆
☆
दिव्यसहस्रनामाचा जन्म आणि जगातला पहिला ‘Tape Recorder’ : स्फटिक
कुरुक्षेत्रावर कोणी notes घेतले नाहीत, मग विष्णू सहस्त्रनाम आपल्यापर्यंत कसे पोहोचले?
आपल्याला माहीत असलेली गोष्ट :
भीष्म पितामह बाणांच्या शय्येवर. युधिष्ठिर समोर. श्रीकृष्ण साक्षीला. वेदव्यास उपस्थित. भीष्मांनी विष्णूची एक हजार नावे सांगितली.
आपण सगळे हे जाणतो.
पण एक प्रश्न कधी मनात आला का?
त्या भयाण रणांगणावर, बाणांच्या शय्येजवळ बसून कोणी notes घेतल्या होत्या का? कागद होता? लेखणी होती? कोणी लिहित होते का?
नाही.
आणि इथेच सुरू होते, ती गोष्ट ~ जी तुम्ही आधी कधीच ऐकली नसेल.
भीष्मांनी सांगितले ~ पण कोणी लिहिले नाही!
भीष्म पितामह जेव्हा विष्णूची सहस्त्र नावे सांगत होते, तेव्हा तिथे असलेले सगळे म्हणजे युधिष्ठिर, पाचही पांडव, श्रीकृष्ण, वेदव्यास सगळे डोळे मिटून तल्लीन होऊन ऐकत होते. भीष्मांचे सांगणे संपले आणि सगळ्यांनी डोळे उघडले.
पहिला आवाज आला युधिष्ठिराचा–
“थांबा… पितामहांनी एक हजार नावे सांगितली. आपण सगळे ऐकत होतो. पण कोणी लिहून ठेवले का? क्रम गेला! सहस्त्रनाम हरवले!”
सगळे एकमेकांकडे पाहू लागले.
मग सगळ्यांनी श्रीकृष्णाकडे पाहिले..
“तुम्ही सांगा, तुम्हाला आठवत असेल!”
श्रीकृष्ण शांतपणे म्हणाले “मी पण तुमच्यासारखाच ऐकत होतो. माझ्याकडेही उत्तर नाही. ”
सगळे हतबल झाले. इतके मोठे ज्ञान आणि ते हरवणार?
मग श्रीकृष्णाने सांगितला एक अद्भूत उपाय!
श्रीकृष्ण म्हणाले : एकच मार्ग आहे. सहदेव.
सगळे चकित झाले. सहदेव? पाचव्या पांडवाला हे कसे शक्य होईल?
श्रीकृष्ण म्हणाले “सहदेव हा आपल्यात एकमेव असा आहे, जो शुद्ध स्फटिकाची माळ घालतो. स्फटिकाचा स्वभाव असा आहे, की शांत वातावरणात उच्चारलेले शब्द तो आपल्यात साठवून ठेवतो. भीष्मांनी जेव्हा ती नावे सांगितली, तेव्हा सहदेवाच्या स्फटिकाने ते सगळे टिपून ठेवले आहे. सहदेवाने शिवाचे ध्यान केले, तर तो स्फटिकातून ते ध्वनी परत मिळवू शकतो आणि वेदव्यास ते लिहून घेतील. “
जगातील पहिला ‘Tape Recorder’
स्फटिक!
सहदेव आणि वेदव्यास त्याच जागी बसले, जिथे भीष्म पितामहांनी सहस्त्रनाम सांगितले होते.
सहदेवाने शिवाचे ध्यान सुरू केले. स्फटिकात साठलेले ध्वनी हळूहळू प्रकट होऊ लागले आणि वेदव्यास एकेक नाव लिहून घेऊ लागले.
असे वेदव्यासांनी विष्णू सहस्त्रनाम लिहून महाभारतात समाविष्ट केले.
हे सांगताना कांची परमाचार्य श्री चंद्रशेखर सरस्वती स्वामी म्हणाले, “जगातील सर्वात पहिला Tape Recorder म्हणजे हा ‘स्फटिक’ ज्याने आपल्यासाठी विष्णू सहस्त्रनाम जपून ठेवले. “
हे ऐकून सगळे स्तब्ध झाले.
आणखी एक गोष्ट, जी कमी माहीत आहे.
महाभारतात दोन महान उपदेश आहेत : एक अर्जुनाला कुरुक्षेत्रावर श्रीकृष्णाने दिलेली भगवद्गीता आणि दुसरा युधिष्ठिराला भीष्मांनी दिलेले विष्णू सहस्त्रनाम आणि हे दोन्ही वेदव्यासांनी लिहून ठेवले. विशेष म्हणजे, विष्णू सहस्त्रनाम सांगताना श्रीकृष्ण स्वतः श्रोता होते!
विचार करा… ज्याची नावे सांगितली जात होती, तो स्वतः ऐकत होता!
हे किती जुने आहे?
महाभारत युद्ध साधारण इसवीसनपूर्व ३०६७ मध्ये झाले, असे मानले जाते ~ म्हणजे विष्णू सहस्त्रनाम आपल्यापर्यंत येऊन आता जवळपास ५१०० वर्षे झाली आहेत.
५१०० वर्षांपूर्वी रणांगणावर सांगितलेले, एका स्फटिकात साठलेले; वेदव्यासांनी लिहून ठेवलेले आणि आज आपण घरी बसून म्हणतो. हा धागा तुटला नाही, कारण श्रद्धा तुटली नाही.
आजचा विचार :
पुढच्या वेळी विष्णू सहस्त्रनाम जेव्हा म्हणाल, तेव्हा एक क्षण थांबा!
कुरुक्षेत्राच्या त्या भयाण रणांगणावर, बाणांनी घायाळ झालेल्या भीष्मांनी जे सांगितले, सहदेवाच्या स्फटिकाने जे जपले, वेदव्यासांनी जे लिहिल; ते ५१०० वर्षांनंतर तुमच्या ओठांवर आहे.
हे नुसते शब्द किंवा स्तोत्र नाही, ही दिव्य स्पंदनं आहेत!
॥ॐ नमो भगवते वासुदेवाय॥
☆
लेखक : अज्ञात
प्रस्तुती – श्री सुनीत मुळे
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
’हसणं’ ही ईश्वराने फक्त माणसाला दिलेली एक अद्भुत देणगी आहे. पण आजच्या धावपळीच्या जगात आपण हे साधं, सोपं सुख कुठेतरी हरवून बसलोय की काय, असं वाटतं. ज्या दिवशी आपण मनमोकळं हसलो नाही, तो दिवस खरोखरच ‘वेस्ट’ आहे.. !
आयुष्यात संकटं कोणाला नाहीत? प्रत्येकाच्या पाठीवर दुःखाची एक छोटी-मोठी गोणी असतेच. पण जो माणूस या संकटांकडे बघून एक ‘तिरकस’ का होईना, पण हसू देऊ शकतो, त्याच्यातला अर्धा ताण तिथेच विरघळतो.
लहानपणीच्या त्या “हसी तो फसी” या डायलॉगमध्ये आपण अडकून पडलो होतो, पण मोठेपणी कळतं की हसू हे कोणाला ‘फसवण्यासाठी’ नाही, तर स्वतःला ‘सावरण्यासाठी’ असतं. लाफ्टर थेरपीमध्ये कृत्रिमरीत्या हसणारे लोक जेव्हा आपण पाहतो, तेव्हा जाणीव होते की, ‘आतलं हसू’ आज किती महाग झालंय. समोरच्याचा अपमान करण्यासाठी आलेलं हसू हे विष असतं, तर कुणाचं दुःख हलकं करण्यासाठी दिलेलं हसू हे अमृत असतं. स्वतःवर हसायला ज्याला जमतं, त्याला जग जिंकणं सोपं जातं. जगातील सर्वात पुण्यवान माणूस तोच, जो स्वतःच्या डोळ्यात पाणी असताना समोरच्याला हसवण्याची ताकद ठेवतो.
तुमचा हसरा चेहरा हा केवळ तुमचा दागिना नाही, तर तो तुमच्या सभोवतालच्या लोकांसाठी एक आशेचा किरण असतो. म्हणूनच, अट्टाहासाने का होईना, पण हसायला शिका. आरशात बघून स्वतःला एक स्माईल द्या, जुन्या आठवणी काढून मित्रांसोबत खिदळा आणि हो… एखादा विनोद समजला नाही, तरी दुसऱ्याचं हसू बघून हसा! त्यातही एक वेगळीच मजा आहे.
हसण्याचं हे ‘बजेट’ कधीच कमी होऊ देऊ नका!
☆
लेखक:अज्ञात
प्रस्तुती: शुभदा कुलकर्णी
कोथरूड-पुणे
मो.९५९५५५७९०८
≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ मैत्रिणींचं माहेरपण… – लेखिका : अर्चना अनंत ☆ प्रस्तुती – सुचिता पंडित ☆
☆
शरयू मोबाईल हातात घेऊन शांतपणे बसली होती. सकाळपासून व्हॉट्सॲप आणि फेसबुकवर एकामागून एक स्टेटस दिसत होते.
”अधिक मासाचं वाण मिळालं…”
“माहेरहून ओटी आली…”
“भावाने खास बोलावलं…”
कुठे लेकींचे फोटो, कुठे माहेरच्या अंगणात काढलेले क्षण, तर कुठे आईच्या हातचा स्वयंपाक.
स्टेटस पाहताना शरयूच्या ओठांवर हलकंसं हसू आलं, पण मनात कुठेतरी एक हुरहूर दाटून आली.
”आपलं असं कौतुक कधी झालंच नाही…” ती स्वतःशीच पुटपुटली.
खिडकीतून बाहेर नजर गेली. समोरच्या झाडावर पक्षी किलबिल करत होते. घरात सगळं सुरळीत होतं. संसार, मुलं, जबाबदाऱ्या… काहीच कमी नव्हतं.
तरीही मनाच्या एखाद्या कोपऱ्यात माहेर नावाचा एक नाजूक धागा अजूनही जिवंत होता.
तेवढ्यात मोबाईल वाजला. स्क्रीनवर नाव झळकलं — माधवी.
”हॅलो, काय करतेस गं?” माधवीने विचारलं.
”काही नाही गं. हे अधिक मासाचे स्टेटस बघत होते.”
माधवी हलकंसं हसली, “माझंही तेच चाललंय. आई-बाबा होते तोपर्यंत थोडंफार तरी अधिक मासाचं कौतुक व्हायचं. आता तर माहेरच संपलं म्हण ना!”
क्षणभर दोघीही शांत झाल्या.
”अगं, आपण आता पन्नाशी पार केलीये. कुठे अशा अपेक्षा ठेवायच्या आता?” शरयू म्हणाली.
”अपेक्षा नाही गं…” माधवीचा आवाज किंचित भरून आला, “पण कधीतरी वाटतं ना… कुणीतरी हक्काने म्हणावं, ‘ये गं माहेरी.’ भाऊ आहे, वहिनी आहेत. त्यांचा संसार, त्यांची मुलं, त्यांच्या जबाबदाऱ्या… तेही त्यांच्या जागी चुकीचे नाहीत. पण मनातली माहेराची ओढ कधी संपत नाही गं!”
शरयूच्या मनातलं जणू माधवीच बोलत होती. फोन ठेवला, पण दोघींच्या मनातले विचार थांबत नव्हते.
शरयूने लगेच त्यांच्या मैत्रिणींच्या ग्रुपवर एक मेसेज टाकला — “सांगा बरं, तुमचं माहेरपण अजून टिकून आहे का?”
काहीच क्षणांत उत्तरांचा पाऊस सुरू झाला…
”माझा तर भाऊच नाही…”
“आई गेल्यापासून माहेरी जाण्याचं कारणच उरलं नाही…”
“भाऊ आहे, पण आता पूर्वीसारखं काही राहिलं नाही गं…”
“माहेर आहे, पण तिथे आता माहेरपण नाही…”
एकामागून एक मेसेज वाचताना शरयूच्या लक्षात आलं की, ग्रुपमधली एकही मैत्रीण अशी नव्हती, जिला अजूनही जुन्यासारखं हक्काचं माहेर लाभलं होतं.
त्या रात्री शरयूने माधवीला पुन्हा फोन केला.
”ऐक, एक कल्पना आहे.”
”काय?”
”आपणच आपल्या मैत्रिणींचं माहेरपण जपायचं!”
क्षणभर पलीकडून शांतता पसरली. “म्हणजे? काय म्हणायचंय तुला?” माधवीने विचारलं.
”अधिक मासानिमित्त सगळ्या मैत्रिणींना घरी बोलवू. पण अगदी सरप्राइज! कुणालाच काही सांगायचं नाही. प्रत्येकीची ओटी भरायची, छोटंसं गिफ्ट द्यायचं आणि एक दिवस त्यांना पुन्हा माहेरची लाडकी लेक असल्याचा अनुभव द्यायचा.”
माधवी काही क्षण गप्प राहिली. मग तिचा भरून आलेला आवाज ऐकू आला, “शरयू… ही फक्त कल्पना नाही गं… ही तर एक सुंदर भावना आहे!”
पुढचे काही दिवस दोघींची अक्षरशः धावपळ सुरू झाली. स्वयंपाकाचा बेत त्यांनी स्वतः ठरवला. आंब्याचा रस, मऊसुत पुरणपोळी आणि सगळ्यांचे आवडीचे पदार्थ… सोबतीला ओटीचं सामान, भेटवस्तू, सजावट… सगळं काही दोघींनी मिळून केलं.
पण तयारी करताना त्यांच्या मनात अनेक शंका आणि प्रश्नही येत होते.
”उगीच तर नाही ना करत आपण हे सगळं?”
“लोकांना आवडेल का?”
“कोणी याला नाटक तर म्हणणार नाही ना?”
“या वयात अशा गोष्टींनी कोण भावूक होतं?”
पण प्रत्येक वेळी त्यांच्या मनातून एकच उत्तर यायचं — “जर यामुळे कुणाच्या चेहऱ्यावर घटकेचा आनंद मिळणार असेल, तर हे जरूर करायचं!”
ठरलेल्या दिवशी घर फुलांनी सजलं होतं. दारात सुंदर रांगोळी काढली होती. स्वयंपाकघरातून रसाचा आणि पुरणपोळीचा सुगंध दरवळत होता.
एकामागून एक मैत्रिणी येऊ लागल्या. सगळ्यांना वाटलं होतं की, हा नेहमीसारखाच एखादा गेट-टुगेदर असेल. गप्पा, जेवण आणि जुन्या आठवणी. हशा, टाळ्या, कॉलेजचे दिवस, लग्नानंतरचे किस्से… घर आनंदाने आणि किलबिलाटाने भरून गेलं होतं.
आणि मग अचानक शरयूने घोषणा केली, “आजचा कार्यक्रम इथेच संपत नाहीये…”
त्यानंतर एकेक मैत्रीण पाटावर बसू लागली. तिची प्रेमाने ओटी भरली जाऊ लागली, हातात सुंदर भेटवस्तू दिली गेली. आणि शरयू-माधवी दोघीही प्रत्येकीला एकच वाक्य सांगत होत्या — “आज तू आमच्या माहेरची लेक आहेस!”
ते वाक्य ऐकताच अनेकांच्या डोळ्यांतून घळघळा अश्रू वाहू लागले. कित्येक वर्षांनी कुणीतरी त्यांना ‘लेक’ म्हणून जपलं होतं. कित्येक वर्षांनी कुणीतरी त्यांच्या मनातल्या त्या रिकाम्या कोपऱ्यावर मायेचा हात ठेवला होता.
पण अजून एक भावूक क्षण बाकी होता…
ग्रुपमधली एक मैत्रीण, जिला सगळ्या जणी हक्काने “झाशीची राणी” म्हणायच्या. स्वभावाने अत्यंत कणखर, निर्भीड, कधीच न रडणारी आणि वेळ प्रसंगी सगळ्यांना आधार देणारी.
तिची ओटी भरून झाल्यावर ती काही क्षण शांत उभी राहिली. अचानक ती शरयूच्या जवळ आली आणि पुढच्याच क्षणी तिच्या गळ्यात पडून रडू लागली… अगदी एखाद्या लहान मुलीसारखी! तिच्या डोळ्यांतून अश्रू थांबत नव्हते.
भरून आलेल्या आवाजात ती म्हणाली, “अगं शरयू… माझ्यासाठीही कुणी असं काही करू शकतं, असं मला कधी वाटलंच नव्हतं गं!” ती थोडी थांबली आणि पुढे म्हणाली, “आई-वडील जिवंत होते, तेव्हाही माझं असं कौतुक कधी झालं नाही… आज पहिल्यांदाच वाटतंय, मी सुद्धा कुणाची तरी लाडकी लेक आहे!”
क्षणभर घरात पूर्ण शांतता पसरली. कोणाच्याही डोळ्यांतलं पाणी लपून राहिलं नाही.
शरयू आणि माधवी एकमेकींकडे पाहत होत्या. त्यांच्याही डोळ्यांत आनंदाश्रू होते. कारण त्या एका वाक्याने त्यांना त्यांच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिली होती.
”आपण उगीच तर नाही ना केलं?”, “लोक काय म्हणतील?”, “कुणाला आवडेल का?” — या सगळ्या शंकांना त्या एका भावनिक क्षणाने पूर्णविराम दिला होता.
त्यांना जाणवलं की, आपण काहीच चुकीचं केलं नाही. आपण फक्त काही रिकाम्या झालेल्या मनांना मायेचा ओलावा दिला, काही हरवलेल्या आठवणींना पुन्हा उजाळा दिला आणि काही स्त्रियांना पुन्हा एकदा “लेक” असल्याची जाणीव करून दिली.
त्या दिवशी गिफ्टची किंमत महत्त्वाची नव्हती, की ओटीत काय होतं याला अर्थ नव्हता. महत्त्व होतं ते फक्त त्या शुद्ध भावनेला, त्या मायेला आणि त्या आपलेपणाला!
कारण स्त्री कितीही मोठी झाली, कितीही कणखर झाली, तिने कितीही जबाबदाऱ्या पेलल्या… तरी तिच्या मनात एक छोटीशी मुलगी कायम जिवंत असते, जिला कधीतरी हक्काने माहेरी जायचं असतं.
आणि त्या दिवशी शरयू आणि माधवीने त्या सगळ्या मुलींना पुन्हा एकदा त्यांचं हक्काचं माहेर मिळवून दिलं होतं.
खरंच… माहेर हे फक्त एक विटांचं घर नसतं, माहेर ही एक निखळ भावना असते. आणि त्या दिवशी त्या सगळ्या मैत्रिणींना त्यांचं हरवलेलं माहेर पुन्हा सापडलं होतं… मैत्रीच्या रूपाने!
@ अर्चना अनंत
माझं मनोगत…
ही कथा काल्पनिक नाही. यातला भावनिक अनुभव आम्ही मैत्रिणींनी प्रत्यक्ष जगला आहे. अधिक मासानिमित्त आम्ही सगळ्या मैत्रिणींना एकत्र बोलावलं, त्यांची ओटी भरली, त्यांचं कौतुक केलं आणि त्यांना पुन्हा एकदा “लेक” असल्याची जाणीव करून देण्याचा छोटासा प्रयत्न केला. त्या क्षणी अनेकांच्या डोळ्यांत आनंदाश्रू होते आणि मन भरून आलं होतं.
पण या निमित्ताने माझ्या स्वतःच्या मनातही काही विचार आले.
आम्ही चार बहिणी. वडील आमच्या लहानपणीच गेले. आर्थिक परिस्थिती जेमतेम . त्यामुळे वाण, औक्षण, भेटवस्तू किंवा अशा प्रकारचं विशेष कौतुक आमच्या वाट्याला फारसं आलं नाही. पण त्याबद्दल मला कधीच वाईट वाटलं नाही. कारण माझ्या आईने आम्हाला जे भरभरून प्रेम दिलं, ज्या ताकदीने उभं केलं आणि प्रत्येक अडीअडचणीत जी साथ दिली, त्याची किंमत कोणत्याही भेटवस्तूपेक्षा खूप मोठी होती.
आज आई नाही. तिच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी कुणीही भरून काढू शकत नाही. कितीही मोठं गिफ्ट मिळालं, कितीही प्रेमाने औक्षण झालं, तरी आईच्या मायेची सर त्याला येऊ शकत नाही.
मला वाटतं, अशा भेटीगाठी, असे उपक्रम आणि अशा प्रेमाच्या क्षणांमुळे मनाला आधार मिळतो, जुन्या जखमांवर मायेची फुंकर बसते. पण खरं माहेर आपण आपल्या आठवणींत जपून ठेवलेलं असतं. आई-वडिलांचं प्रेम, त्यांचे संस्कार, त्यांचे आशीर्वाद आणि त्यांच्यासोबत घालवलेले क्षण हेच आयुष्यभर आपली खरी संपत्ती असते.
आपली माणसं आपल्यापासून दूर जातात, पण त्यांचं प्रेम कधीच दूर जात नाही. ते आपल्या प्रत्येक आठवणीत, प्रत्येक यशात आणि प्रत्येक संघर्षात आपल्यासोबत असतं. म्हणूनच मला वाटतं, माहेर फक्त एका घरात नसतं; ते आपल्या मनात, आपल्या स्मृतीत आणि आपल्या जपलेल्या प्रेमात कायम जिवंत असतं.
☆
लेखिका: अर्चना अनंत
प्रस्तुती: सुचिता पंडित
≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
सकाळच्या गडबडीत नेमकी ट्रॉली बाहेर ओढताना अडकली… धड ना आत, धड ना बाहेर… वैतागच… नेमके चहा साखरेचे डबे आत अडकले…! आतल्याआत चडफड नुसती… आता सुतार बोलवावा लागणार… एवढ्याशा कामाकरता तो आढेवेढे घेणार… नाहीतर बजेट वाढवून या कशा मोडीत काढायला झाल्यात, याची गाथा वाचणार. आजकाल मॉड्यूलर किचन कसं जोरात चाललंय… माझी इकडे कामं आणि तिकडं कामं. सगळं क्षणात मनात आणि डोळ्यांसमोरुन तरळूनच गेलं.
जोर देऊन जरा ओढून बघितलं तर कड्कट् आवाज काढलाच तिने. लादी पुसायला आलेल्या मावशी म्हणाल्या, खोबरेल तेलाचं बोट फिरवा ताई.. कडेच्या पट्टीवर… सरकेल… तात्पुरते तरी निभावेल…! चांगली आयडिया… मी पट्कन तेलाचं बोट फिरवलं… दोन मिनिटांनी ट्रॉली मऊसरपणे आतबाहेर डोकावली… कसलं भारी काम झालं एकदम! मी एकदम आनंदाने तिला धन्यवाद देत म्हणलं, “बरं झालं बाई, वेळेत आलीस… नाहीतर… चहा पावडर विकत आणावी लागली असती. “ती हसली…
“वंगण लागतंय ताई, थेंबभरच पुरतं, पण लागतं कधीमधी आणि वेळेवर! ते मिळालं की सगळं सुरळीत होऊन जातं बघा क्षणात! “
खरंच, वंगण लागतं…!
फक्त मशीन, वस्तूंनाच नाही तर माणसालाही, अगदी त्याच्या देहाइतकंच मनालाही, अगदी नात्यांनाही वंगण अवश्यक आहे.
चार चांगल्या शब्दांचं, आश्वासक स्पर्शाचं, सदिच्छांचं, विचार वाचनाचं, सूरमैफिलींचं, श्रद्धा भक्तीचं, नजरेतल्या भावाचं, योगनिद्रेचं, कलाकल्पनेचं. जे मनाला मोडकळीस येण्यापासून वाचवतं. मरगळ येऊन कोरड्या ठक्क पडलेल्या वृत्तीवर हे वंगण पूर्ववत जगण्याकडे अलगद घेऊन जातं.
लहानपणी आजी सगळ्या नातवंडांना ओळीत बसवून चहाबरोबर एरंडेल पाजायची. प्यायचं म्हणजे प्यायचं… कितीही आदळापट केली तरी ती तिचा हेका सोडायची नाही. पोट आतड्याचं ते वंगणच आहे… महिना- दोन महिन्याने एकदा घेतलं की पोटाचं काम निर्धोक चालू राहतं… आणि तुम्ही मग आबरचबर हादडायला मोकळे… कानात तेल, नाकात दोन थेंब तूप, डोक्यावर बुदलीभर कोमट तेल… शनिवारी रात्रीचा हमखास वंगणाचा कार्यक्रम कित्येक वर्षे आमच्या पिढीने खरं तर अनुभवला. रात्री झोपल्यावर कधीतरी काशाच्या वाटीने तळपाय घासून द्यायची… शरीरातल्या उष्णतेवरचं तिचं ते वंगण होतं.
खरं तर जन्मापासून हे वंगण वेगवेगळ्या रूपात आपली सोबत करत राहतं… आपले शारीरिक, आर्थिक, मानसिक मार्ग निर्धोक करत राहतं, कारण स्निग्धता हा भाव ओतप्रोत या वंगणात भरलेला आहे.
जाईल तेथे मऊपण पेरणं, कोरडेपण- गंज मिटवणं आणि पूर्वस्थितीत आणून सोडणं.. हा (स्व)भावच आहे वंगणाचा!
क्षमा, सोडून देणं, माघार घेणं, प्रसंगानुरूप मदतीला जाणं, हळूवार फुंकर घालणं, स्वच्छ शुद्ध अंतःकरणाने समोरच्याशी शांतपणे बोलणं… हे ही नाती जपण्यासाठी लागणारं एक प्रकारचे वंगणच आहे.
वंगण नसतं तर जगात फक्त खडखडाटच ऐकू आला असता, असं मला नेहमी वाटतं… जीवनातले स्निग्धांश संपले तर फक्त कोरडेपण उरेल… आणि कोरडेपण क्षणात भस्मसात होऊन जातं! त्यामुळे जगण्यात येणारे हर एक प्रकारचे वंगण जपणे, प्रसंगी ते वापरणे फार आवश्यक आहे. निर्जीव मशीन सामुग्रीला जिथं त्याचं महत्त्व समजतं, तिथं तुमच्या आमच्यासारख्या जिवांनी ते जाणलंच पाहिजे.. त्याचं जतन केलंच पाहिजे… तर जगणं लयीत.. सुसह्य… होत राहील!
* * * *
लेखिका : विदुला जोगळेकर
प्रस्तुती : उज्ज्वला केळकर
संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३ सेक्टर – ५, सी. बी. डी. – नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र
मो. 836 925 2454, email-id – kelkar1234@gmail.com
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈
सोशल मीडियावर, नात्यांमध्ये, अगदी घरातही आपल्याला दुःख लपवून आनंदी दिसण्याचा सल्ला दिला जातो.
पण प्रत्येक वेळी हसणं खरंच आवश्यक असतं का?
मन आतून तुटत असताना फक्त “मी ठीक आहे, ” असं दाखवणं योग्य आहे का?
माणूस हा भावना असलेला जीव आहे.
त्याला आनंद होतो, पण दुःखही होतं.
त्याला प्रेम वाटतं, पण कधी भीती आणि एकटेपणाही जाणवतो.
आणि या सगळ्या भावना नैसर्गिक आहेत.
पण जेव्हा समाज आपल्याला “दुःखी होऊ नको”, “रडू नको”, “नेहमी मजबूत राहा” असं शिकवतो, तेव्हा आपण आपल्या खऱ्या भावनांपासून दूर जाऊ लागतो.
यालाच “टॉक्सिक पॉझिटिव्हिटी” म्हणतात.
ही अशी सकारात्मकता आहे जी वरून सुंदर दिसते, पण आतून माणसाच्या भावनांना गप्प बसवते.
ती माणसाला समजून घेत नाही, उलट त्याला स्वतःच्या दुःखाबद्दल अपराधी वाटायला लावते.
खरी सकारात्मकता म्हणजे नेहमी हसत राहणं नाही…
तर रडताना स्वतःला स्वीकारणं आहे.
खरी ताकद म्हणजे भावना लपवणं नाही…
तर ‘मला त्रास होतोय’ हे प्रामाणिकपणे मान्य करणं आहे.
कधी कधी माणसाला सल्ल्यांची गरज नसते,
त्याला फक्त कोणीतरी शांतपणे ऐकणारं मन हवं असतं.
“सगळं ठीक होईल” या शब्दांपेक्षा
“मी तुझ्यासोबत आहे” हे शब्द जास्त आधार देतात.
म्हणून आपल्या आसपासच्या लोकांना नेहमी आनंदी राहण्याचा दबाव देऊ नका.
कारण भावना दाबल्याने माणूस मजबूत होत नाही…
तो आतून एकटा पडत जातो.
मानसिक आरोग्याची सुरुवात ‘खोटं हसण्यात’ नाही,
तर ‘खऱ्या भावनांना स्वीकारण्यात’ असते.
खरी सकारात्मकता म्हणजे नेहमी हसत राहणं नाही…
आपल्या आजूबाजूला असणाऱ्या लोकांच्या भावनांना जागा द्या.
त्यांना रडू द्या, बोलू द्या, व्यक्त होऊ द्या.
टॉक्सिक पॉझिटिव्हिटी : नेहमी आनंदी राहण्याचा अतिरेक होत चाललाय का, हा विचार करायची वेळ आली आहे.
टॉक्सिक पॉझिटिव्हिटी म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या दुःख, राग, भीती, ताण किंवा नैराश्य यांसारख्या भावना दुर्लक्षित करून तिला जबरदस्तीने सकारात्मक राहण्यास सांगणे. यात व्यक्तीच्या खऱ्या भावनांना महत्त्व दिले जात नाही.
टॉक्सिक पॉझिटिव्हिटी का घातक आहे?
प्रत्येक माणूस आयुष्यात वेगवेगळ्या भावना अनुभवत असतो. आनंद, दुःख, राग, भीती, निराशा या सगळ्या भावना नैसर्गिक आहेत. पण जर एखाद्याला सतत “नकारात्मक विचार करू नकोस” असे सांगितले गेले, तर त्या व्यक्तीला स्वतःच्या भावना चुकीच्या वाटू लागतात.
यामुळे व्यक्ती:
भावना दाबून ठेवते
एकटेपणा अनुभवते
स्वतःला दोष देते
मानसिक तणाव वाढतो
मदत मागण्यास घाबरते
समुपदेशनामध्ये (Counseling) व्यक्तीच्या भावना समजून घेणे आणि स्वीकारणे खूप महत्त्वाचे असते. फक्त सकारात्मक बोलून समस्या दूर होत नाहीत.
दैनंदिन जीवनातील उदाहरणे
१. दुःखी व्यक्तीला जबरदस्ती सकारात्मक राहायला सांगणे
एखाद्या व्यक्तीच्या जवळच्या नातेवाईकाचा मृत्यू झाला असेल आणि ती व्यक्ती रडत असेल, तर काही लोक म्हणतात:
“रडू नकोस, मजबूत बन. ”
“देवाची इच्छा असेल. ”
“सगळं चांगल्यासाठीच होतं. ”
ही वाक्ये ऐकायला सकारात्मक वाटतात, पण त्या व्यक्तीच्या दुःखाला जागा देत नाहीत. अशावेळी “तुला खूप वाईट वाटत असेल, मी तुझ्यासोबत आहे” असे म्हणणे अधिक योग्य असते.
२. विद्यार्थ्यांवरील दबाव
एखादा विद्यार्थी परीक्षेत नापास झाला तर त्याला लगेच:
“Positive रहा. ”
“तू overthink करतोस. ”
“हे काही मोठं नाही. ”
असे सांगितले जाते. पण त्या विद्यार्थ्याच्या मनातील भीती, अपयशाची भावना आणि ताण समजून घेणे गरजेचे असते.
३. नैराश्य असलेल्या व्यक्तीशी वागणे
नैराश्य (Depression) असलेल्या व्यक्तीला अनेकदा:
“फक्त आनंदी राहा. ”
“इतकं काय विचार करतोस? ”
“इतरांचं बघ, त्यांच्याकडे जास्त समस्या आहेत. ”
असे बोलले जाते. यामुळे त्या व्यक्तीला स्वतःच्या भावना व्यक्त करणे कठीण होते.
सोशल मीडियाचा प्रभाव
आज सोशल मीडियावर “Happy Life”, “Positive Vibes Only”, “Always Smile” अशा गोष्टी खूप दिसतात. लोक स्वतःच्या आयुष्यातील फक्त आनंदाचे क्षण दाखवतात. त्यामुळे इतरांना वाटते की आपणच फक्त दुःखी आहोत.
खरं म्हणजे प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात संघर्ष असतात. पण सतत आनंदी दिसण्याचा दबाव मानसिक आरोग्यावर परिणाम करू शकतो.
टॉक्सिक पॉझिटिव्हिटी कशी टाळावी?
जवळच्या व्यक्तींनी:
त्या व्यक्तीचे बोलणे शांतपणे ऐकावे.
तिच्या भावना मान्य कराव्यात
लगेच उपाय देण्याचा प्रयत्न करू नये.
“तुला असे वाटणे स्वाभाविक आहे” असे सांगावे
सह अनुभूती दाखवावी
योग्य प्रतिसाद कसा असावा?
टॉक्सिक पॉझिटिव्हिटी
योग्य आणि समजूतदार प्रतिसाद
“सगळं ठीक होईल. ”
“तू सध्या कठीण काळातून जात आहेस. ”
“रडू नकोस. ”
“रडायला हरकत नाही. ”
“Positive रहा. ”
“तुझ्या भावना महत्त्वाच्या आहेत. ”
“हे काही मोठं नाही. ”
“ही गोष्ट तुला त्रास देत आहे, मी समजू शकतो. ”
भावना स्वीकारणे का महत्त्वाचे आहे?
भावना दडपून टाकल्याने समस्या वाढू शकतात. जेव्हा व्यक्तीला स्वतःच्या भावना मोकळेपणाने व्यक्त करता येतात, तेव्हा तिचा मानसिक ताण कमी होतो. दुःख, भीती किंवा राग या भावना चुकीच्या नसतात. त्या मानवी जीवनाचा भाग आहेत.
मानसिक आरोग्य चांगले ठेवण्यासाठी:
भावना व्यक्त करणे
मदत मागणे
स्वतःला वेळ देणे
स्वतःवर दया ठेवणे हे आवश्यक आहे.
सकारात्मक विचार करणे चांगले आहे, पण प्रत्येक वेळी फक्त सकारात्मक राहण्याचा आग्रह धरणे योग्य नाही. टॉक्सिक पॉझिटिव्हिटीमुळे व्यक्तीच्या खऱ्या भावनांकडे दुर्लक्ष होते आणि मानसिक तणाव वाढू शकतो.
समुपदेशनामध्ये व्यक्तीच्या भावनांना स्वीकारणे, तिला समजून घेणे आणि तिच्यासोबत सहअनुभूतीने उभे राहणे केले जाते. प्रत्येक भावना महत्त्वाची आहे आणि त्या व्यक्त करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. म्हणून कोणावरही टॉक्सिक पॉझिटिव्हिटी ठेवण्याचा दबाव आणू नका.
☆
लेखिका: डॉ. स्वाती गानू
प्रस्तुती : मंजुषा सुनीत मुळे
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈