शोभा जोशी
इंद्रधनुष्य
☆ “परशुराम मातृहत्यारा??” ☆ शोभा जोशी ☆
(डोळे उघडणारा लेख…)
परशुराम हा महर्षी जमदग्नींचा पुत्र होता.
पित्यासारखाच तो शीघ्रकोपी होता.
लढवय्या होता.
विद्वान होता.
त्याने कोकणभूमीची निर्मिती केली.
परशुराम सप्तचिरंजीवांपैकी एक आहे.
इथपर्यंत परशुरामांबद्दल माहिती मिळाल्यावर आदर निर्माण झाला होता. लहानपणापासून कथाकीर्तनाकडे ओढा असल्याने ही माहिती अनेकदा मिळाली.
पण जेव्हा बुवांनी कीर्तनात, परशुरामाने पिता जमदग्नी यांच्या आदेशानुसार माता रेणुकेचे शीर उडवून तिचा वध केला आणि नंतर पित्याला विनवणी करून मातेला परत जिवंत केले ही कथा सांगितली तेव्हा अंगावर शहारे आले.
परशुरामांबद्द्ल एक अढी बसली. असा कसा पोटचा मुलगा तोही विचारी, विद्वान वगैरे असणारा आईचा जीव घेतो?
कळत नकळत परशुरामांबद्दल दुरावा किंवा एक तुटकपणा निर्माण झाला. त्या विषयात आपलेपणा किंवा जिव्हाळा निर्माण व्हायला काही कारणही नव्हतं. अगदी ज्या कोकणात आपण राहतो त्याची निर्मिती कशी केली असेल याची साधी जिज्ञासा ही कधी जागी झाली नाही.
पण हा दुरावा समूळ नाहीसा व्हावा अशी या चिरंजीवाचीच इच्छा असावी.
चिपळूण मधील परशुराम देवस्थानाचे विश्वस्त श्री. प्रशांत पटवर्धन यांना भगवान परशुराम यांच्या जीवनातील प्रसंगांवर कथालेखन करायचे होते. हाती असलेल्या माहितीचं कथेत रुपांतर असं करावं याचं मार्गदर्शन त्यांना हवं होतं. योगायोगाने त्यांच्या जवळच्या मित्राने. जो मलाही लेखिका म्हणून चांगलं ओळखतो,त्याने माझं नाव सुचवलं. आणि आमची फोनवरची कथा कार्यशाळा सुरू झाली.
प्रशांत उत्तम विद्यार्थी आहेत असं माझ्या लक्षात आलं. कथालेखनाचा गृहपाठ ते चोख करत गेले.
ते माझ्याकडून काय शिकले यापेक्षा मला परशुरामांकडे पाहण्याची जी दृष्टी मिळाली ती मला जास्त मौल्यवान वाटते.
परशुरामांचं चरित्र अनेक प्रसंगांतून समोर येत गेलं.
सर्वात मला उत्सुकता होती ती त्यांच्या मातृहत्यारा या प्रतिमेबद्दल.
तर त्याबद्दल संशोधकांनी शोधलेली माहिती अशी…
कामरूप प्रदेशातील संपूर्ण जमीन मृतप्राय झालेली होती. पाण्याचे मोठ्या प्रमाणावर दुर्भिक्ष्य निर्माण झालेलं होतं. वर्षानुवर्ष पाणी नसल्यामुळे सर्वत्र शुष्कता होती. मानवी जीवन,पशुपक्षी कीटक, वनस्पती जीवन यांचा सर्वनाश होत होता.
कसेबसे तग धरून असलेले काही शेतकरी महर्षी ऋचिक यांच्या आश्रमात आले. ऋचिक हे जमदग्नींचे पिता. त्यांनी कामरूप त्या भूमीला सुजला सुफला करून सजीवसृष्टीला संजीवनी देण्याची याचना त्यांनी केली.
जवळच असलेल्या जमदग्नी ऋषींनी भगवान परशुरामाला आदेश दिला.
.. “राम,तुम्ही त्या प्रदेशात जाऊन तिथल्या लोकांत विश्वास निर्माण करा आणि ती मृत झालेली भूमी पुन्हा जिवंत करा. “
आपल्या तीन अनुयायांना घेऊन परशुराम मार्गस्थ झाले.
सांगाडा झालेले वन प्रदेश,डोंगर वाटा,नदीचे कोरडे पात्र पार करत ते कामरूप प्रदेशात पोचले.
कामरूपचं स्वरूप भयावह होतं. भूमीचा कण न् कण पाण्यासाठी तडफडत होता. आक्रोशत होता.
परशुरामांनी जमिनीची पाहणी केली. अभ्यास केला. भू-जलाचा अंदाज घेतला. भूमीचा ध्वनी ऐकण्याचा प्रयत्न केला. मग ब्रह्मपुत्रा नदीच्या उपनद्या जिथून प्रवाही होतात तिथून जल वाहत येऊ शकेल का याचा अंदाज घेतला.
कामरूप प्रदेशाच्या बाजुलाच लोहित नावाचा प्रचंड पर्वत होता. रामांनी तिथल्या स्थानिकांना बरोबर घेऊन लोहित पर्वत पार केला. त्या पर्वतापलिकडे एक मोठे सरोवर होते. जवळूनच एक नदीही वाहात होती. रामांनी संपूर्ण जलाशयाला एक प्रदक्षिणा घातली. भोवतालाचे सूक्ष्म निरीक्षण केले.
भार्गवरामांनी या नदीतीरावर आपल्या वास्तव्यासाठी एक आश्रम बांधला. नदीच्या परिसराचा असून अभ्यास केला. त्या परिसरातील बदलांचा मागोवा घेतला. परिसरातील वयोवृध्द शेतकऱ्यांना विश्वासात घेतलं. त्यांच्या आठवणीतल्या जल व्यवस्थापनाची माहिती घेतली.
या कार्यात दैवी अधिष्ठान असावे म्हणून शिवाची आराधना,होम,जप सुरू केले.
अखेर शिवशंकरांनी दृष्टांत दिला.
आग्नेयेला जा. तिथे भूमीच्या एका कोपऱ्यात हिमनगांनी अडवलेलं विशाल कुंड आहे. त्या कुंडातील जल शीतल,मधुर असून प्राणवर्धक आहे. हेच जल कामरूप प्रदेशाला संजीवन देईल. यशस्वी भव!
शिवाच्या दृष्टांतानुसार परशुरामांनी जल आणि भूमी विषयातील अनुभवी व्यक्ती, वयोवृध्द शेतकरी, ग्रामस्थ आणि विद्यार्थी यांना साहाय्यासाठी आवाहन केलं. चर्चा केली. आखणी केली. तसंच लोहित पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या लोकांनाही विश्वासात घेतलं. संयमित शब्दात योजना समजावून दिली.
“आपल्याला लोहित पर्वताचा एक भाग फोडावा लागणार आहे. त्यामधून एक मार्ग निर्माण करायचा आहे. जलाशयातून निघणारा एक झरा या मार्गाने तुमच्या प्रांतात आणायचा आहे. एकदा या पाण्याचा ओघ सुरू झाला की ओसाड भूमी हरित होईल. पीक येईल. सजीवसृष्टी पुन्हा बहरेल. “
अर्थातच अनेक शंकाकुशंका निघाल्या, नकारात्मक विचार आले, पण परशुरामांनी कुशलतेने निवारण केलं. त्यांच्या आवाहनातील तळमळ प्रभावी ठरली. मग मात्र जोमाने,जिद्दीने आणि अचल निश्चयाने कामाला सामूहिक रित्या सुरूवात झाली.
लोहित पर्वतातील कठीण खडक फोडले गेले. पर्वताची शकले केली. विशाल पाषाण फोडून त्यामागची माती बाजूला केली. पर्वत कापून पलिकडून अलिकडे प्रवासासाठी मार्ग खोदला गेला. जवळच वाहणारी एक प्राचीन नदी वाळलेली होती. पण तिचा मूळ स्रोत जिवंत होता. तिथून पाट काढण्यात आला. जुना प्रवाह शोधून त्याला नव्याने या मार्गांशी जोडलं गेलं.
आणि…
कामरूप प्रदेशातून विस्तीर्ण नदी खळाळून वाहू लागली. तिच्या प्रवाहाने भूमीला नवा जन्म मिळाला.
लोहित पर्वतांतून ही नदी आली म्हणून या नदीचे नावही ‘लोहित नदी’ ठेवलं गेलं. कामरूपची जनता भगवान परशुरामांना शतशः धन्यवाद देत होती.
आता परतीचे वेध लागले होते.
सारे विश्रांती घेत हसत खिदळत श्रमपरिहार करत होते. पराशर मुनींना परशुरामांची चेष्टा करण्याची लहर आली.
“रामा,एकीकडे तर तुम्ही म्हणता भूमी आपली माता आहे;आणि तुम्ही तर तिचं पर्वतस्वरूप मस्तकच कापलंत. “
भार्गवराम शांत होते. ते म्हणाले…
” हो. पर्वत म्हणजे भू मातेचं मस्तक आहे. पण तेच मस्तक इतकं मोठं झालं की पलीकडची भूमी ओसाड झाली. मी शिरच्छेद नाही केला. फक्त मार्ग मोकळा केला. मृत जमीन पुन्हा जिवंत झाली. म्हणजे आईला पुनः जिवंत केलं पण ही माझ्या पित्याची आज्ञा होती. “
“सत्य, त्रिवार सत्य! म्हणजे परशुरामांनी पित्राज्ञेने आपल्या मातेचा शिरच्छेद केला. आणि तिला संजीवनी केलं. “
या रूपकावर सारेच हसले…
गंमतीत सुरू झालेली चर्चा होती ती. तिथे उपस्थित असलेल्या लोकांनी सहज म्हणून इतरांना सांगितली. शब्दांनी आकार घेतला आणि हळूहळू ती गोष्ट कर्णोपकर्णी झाली. लोककथांमध्ये मिसळली आणि तिच्यातला लाक्षणिक अर्थ हरवला.
कथेचा गाभा, सूचक तत्वज्ञान बाजूला राहिलं. लोकांनी फक्त शाब्दिक अर्थाने ती स्विकारली. पिढ्यानुपिढ्या ती तशीच सांगितली गेली. भूमीत प्राण फुंकणा-या परशुरामाचे श्रम,अभ्यास,संघटन कौशल्य,भू-जल मन व्यवस्थापनासाठीचे अभियांत्रिकी ज्ञान सगळं सगळं विसरलं गेलं आणि…
मातृहत्यारा हा विपरीत अर्थाचा डाग लागला…
मंडळी,
मी प्रशांत पटवर्धनांची आजन्म ऋणी आहे.
नवनिर्मितीच्या या विद्वान ऋषींची मला ओळख झाली.
मनातला हा आकाशकंदील उजळला आणि माझ्या कोकण भूमीला मी नव्याने मनोमन दंडवत घातला.
लेखिका : वैशाली पंडित
प्रस्तुती : शोभा जोशी
कार्यकर्ती, जनजाती कल्याण आश्रम, पुणे महानगर.
मो ९४२२३१९९६२
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈


















