मराठी साहित्य – विविधा ☆ प्रतिबिंब ☆ सौ. मंजुषा सुधीर आफळे

सौ.मंजुषा सुधीर आफळे

?  विविधा ?

☆ प्रतिबिंब ☆ सौ. मंजुषा सुधीर आफळे ☆ 

पावसाचे दिवस होते. काहीतरी१७/९/२०२१ बाजारातून आणायचे, म्हणून मी घराबाहेर पडले.त्यातच, थोडे अंतर गेल्यावर पावसाने मला गाठलेच. पाऊस कोसळू लागला. मी पण आडोशाला थोडा विसावा घेत उभी राहिले. विसाव्याच्या क्षणी मन एकांत न शोधेल तर नवलच. “मन वेड असतं” असे म्हणतात, ते पण खरं. विसाव्याच्या क्षणी, मनाच्या गाभाऱ्यात लपलेल्या प्रतिबिंबांना निरखून पाहण्याची एक सवय आपल्याला असतेच. मी पण या क्षणी वेगवेगळी प्रतिबिंब पाहण्यात दंग झाले.

मी जिथे उभी होते, तिथून काही अंतरावर असलेल्या जागेकडे माझी नजर पुन्हा पुन्हा वळत होती. कारण, मला रोज बकुळा येथेच भेटत होती. अगदी याच वेळी. आजही तिच्या आठवणींनी मन बेचैन झाले. बकुळा आता दूर गावी गेली होती. आमच्या राहत्या घराच्या पाठीमागे असणाऱ्या, एका बिल्डिंग मध्ये ती राहत होती. ती जवळच्याच एका गतिमंद मुलांच्या शाळेत जात असे. आमच्या घराच्या समोरील रस्त्यावरूनच ती येत जात असे. मीही कधी कधी मोकळा वेळ मिळेल, तेव्हा त्याच शाळेत मुलांना भेटायला जात असे. संध्याकाळी फिरायला गेल्यावर, किंवा मंदिरात बकुळा मला भेटत असे. ती दिसायला खूपच छान होती. उंची तशी कमीच, आवाज मात्र मोठा. जीभ थोडी जड असल्याने कधी कधी तिचे बोलणे कळत नसे. स्वच्छ पण थोडे अघळपघळ कपडे ती घालत असे. केस  छोटे. पण डोळे मात्र खूपच बोलके. रस्त्यात गर्दीच्या ठिकाणी,  ती मला नेमकेपणे ओळखत असे. माझा हात आपल्या हातात पकडून, “ताई, उद्या येणार ना शाळेत?” असे विचारत असे. मग मी, “हो, तू पण ये हा” असे म्हणल्या शिवाय तिचे समाधान होत नव्हते. तिचा तो प्रेमळ स्पर्श आमचे आदल्या जन्मीचे ऋणानुबंध असल्याचे सांगुन जाई. तिच्या इतके प्रेमळ निरागस व भाबडे हास्य, मी याआधी आणखी कुणाचेही पाहिले नाही. काही क्षणांतच, ती आपला हात घाईघाईने सोडवून घेत असे. व हसत हसत झपाझप पुढे निघून जाई. एवढीच काय ती भेट. पण या भेटीची ही मनाला सवय लागली होती. आज तिच्या आठवणीने मनात प्रश्न उमटत राहिले. खरेच, कशी असेल ती? नवीन जागेत तिला समरस होता आले असेल का? आपली आठवण तर येतच असेल. आणि मी मनातल्या मनात प्रार्थना करू लागले.” देवा, तिला आवडणारी एखादी ताई तिला लवकर भेटू दे. ती नेहमी आनंदी, सुरक्षित, व सुखी राहू दे. आता पाऊस थांबला. मी पण एकांतातून  बाहेर आले. काम आटपून घरी आले. आणि दारातच असणाऱ्या नारळीच्या झाडाकडे माझे लक्ष गेले. त्या नारळीच्या झाडात, एक छोटे सुपारी चे झाड आपोआप आले होते. ते झाड पाहून आम्ही सर्वजण आनंदित झालो. त्याची नीट काळजी घेऊ लागलो. पण तरी हळूहळू लक्षात येऊ लागले की, झाडाची वाढ खुरटली आहे. पाणी भरपूर असले तरी, सूर्यप्रकाशा साठी सुपारीला संघर्ष करावा लागत होता. नारळीच्या झावळ्यांचा, मोठा पसारा तिच्या डोक्यावर होता. नाजूक असूनही हे झाड, नारळी च्या कुशीत धिटाईने उभे होते. नुकत्याच, छोट्या छोट्या हिरव्या झावळ्या फुटल्या होत्या. तरीपण रोज पाणी घालताना काळजी वाटत होती. अगदी बकुळी सारखीच. कसे होईल या सुपारीचे? बाकी झाडांचे काय? आणि माणसांचे काय? सुख दुःख सारखेच की, दोन्हीही सजीव आहेत. आपला जिवंतपणा टिकवून चैतन्य देत राहतात. त्यांच्या सहवासात येणाऱ्यांना नवीन ऊर्जा देत राहतात. पण एकदा का त्यांची वाढ खुंटली. तर मात्र त्यांच्याकडे विशेष लक्ष द्यावे लागते. त्यांच्या वेगळ्या अस्तित्वाची जाणीव होऊ लागते. आणि मन जरा हळवे होतेच. पण त्यांच्यातील एकाकीपणा न्यूनता कमी करण्याच्या प्रयत्नात, आपल्याला हातभार लावता आला, तर तो आनंद फुलवताना खूप समाधान मिळते. व अशा वेळी आपल्याला होणारे कष्ट, खूपच क्षुल्लक वाटतात. म्हणूनच असे अनमोल क्षण अनुभवायचे, व मनाच्या कोपऱ्यात जपून ठेवायचे. आठवणींची ही “मोरपिसे” मनाच्या आरशात प्रतिबिंब होऊन राहतात. आणि आपल्याला बरंच काही   देऊन जातात. आपले मन प्रफुल्लित करणारी असतात. गरज असते, कधीतरी अंतर्मुख होऊन अशी प्रतिबिंब न्याहाळण्याची.  म्हणूनच विसाव्याच्या क्षणी जेव्हा जेव्हा तुम्हाला या आरशात डोकावण्याची संधी मिळेल, तेव्हा ती सोडू नका. या मोरपिशी आठवणी, अनमोल आहेत. आयुष्यात रंगीबेरंगी ऊर्जा, चैतन्य निर्माण करणाऱ्या आहेत. या आपल्याला माणूस म्हणून जगायला शिकवतात.

© सौ.मंजुषा सुधीर आफळे

१७/९/२०२१

विश्रामबाग, सांगली.

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ चं म त ग ! – पोपट ! ☆ श्री प्रमोद वामन वर्तक

श्री प्रमोद वामन वर्तक

? विविधा ?

? चं म त ग ! ⭐ श्री प्रमोद वामन वर्तक ⭐

? पोपट ! ??

सूर्य मावळतीकडे कलला होता. आता अंधार पडायला सुरवात झाली होती.

सगळीकडे शांतता… आजूबाजूला कोणतेही आवाज ऐकू येत नव्हते. वाटेवर पावसाचं पाणी साचल्यामुळे चालताना पायाचा ‘पचक पचक’ असा आवाज तेवढा येत होता….

गण्याला आज घरी जायला जास्तच उशीर झाला होता, त्यात हा पाऊस. पण रस्ता पायखलाचा होता म्हणून ठीक, पण या पावसामुळे आधीच गावच्या रस्त्याला असलेले मिणमिणते दिवे गुल झाले होते. अजून घर येण्यासाठी त्याला भरपूर रस्ता कापायचा होता. आता चांगलाच अंधार पडला होता आणि अमावस्या असल्यामुळे तो जास्तच गडद आणि भीतीदायक वाटत होता. त्यातल्या त्यात त्या अंधारात त्याला हातातल्या मोबाईल मधल्या विजेरीचा काय तो आधार वाटत होता !

तसा गण्या धीट गडी, पण या अमावस्येच्या किर्र रात्री त्याला नको नको ते आवाज येत असल्याचे भास व्हायला लागले. रस्त्यातले ते नेहमीचे पिंपळाच्या पाराचे वळण आले. गण्या मनांत खरंच घाबरला आणि मोठ मोठ्या आवाजात रामरक्षा म्हणू लागला. त्यात बहुतेक मोबाईलची बॅटरी डाउन झाल्यामुळे मोबाईलची विजेरी पण फडफडायला लागली आणि पाराचे वळण येण्या आधीच तिने अखेरचा श्वास घेतला व गण्याच्या डोळयांपुढे काळोख पसरला. तेवढ्यात पारा खालून त्याला कोणीतरी हसल्याचा आवाज आला. तो आवाज ऐकताच मागे वळून न बघता गण्या घराकडे तिरासारखा धावत सुटला. तो थोडा धावला असेल नसेल तोच पुन्हा एकदा त्या हसण्याचा आवाज त्याच्या कानी पडला, त्या बरोबर गण्या अंगातली होती नव्हती ती शक्ती एकवटून पुन्हा घराच्या दिशेने जोरात धावत सुटला. थोडं पुढे आल्यावर गण्या धीर एकवटून रस्त्यात थांबला व त्या आवाजाचा कानोसा घ्यायचा त्याने पुन्हा प्रयत्न केला. पण आता तो आवाज काही त्याच्या कानी पडला नाही. आता घर पण टप्प्यात आलं होतं त्यामुळे त्याच्या जीवात जीव आला.

घरी आल्या आल्या काहीच न बोलता हात पाय धुवून तो जेवायला बसला. जेवताना पण गप्प गप्प ! शेवटी बायकोने न राहून विचारलंच “आज जेवणात काही कमी जास्त झालंय का?” “नाही” “मग आज एकदम गप्प गप्प, कुणाशी भांडण वगैरे?” बायकोला त्या आवाजबद्दल सांगावे का नाही या विचारात त्याच्या तोंडून “काही नाही गं, थोडी कणकण वाटत्ये, म्हणून…” “अगं बाई, मग असं करा जेवण करून, मी काढा करते तो प्या आणि झोपा बघू, म्हणजे तुम्हाला बरं वाटेल.” “बरं” इतकंच म्हणून गण्यान जेवण आटोपत घेतलं आणि तो पलंगावर आडवा झाला. पण निद्रादेवी काही प्रसन्न व्हायचं लक्षण दिसेना. त्यात पुन्हा त्याच्या कानात तो मगाचा हसण्याचा आवाज येत राहिला. कोण हसत असेल? त्या पारावर भूत खेत असल्याच्या वावड्या त्याने लहानपणा पासून ऐकल्या होत्या. त्यात आजची अमावस्येची रात्र, विचार कर करून त्याच्या डोक्याचा भुगा झाला.  तेवढ्यात बायको काढा घेऊन आली. गाण्याने निमूटपणे काढा घेतला आणि डोक्यावर परत पांघरूण घेऊन निद्रादेवीची आराधना करू लागला. पण तो हसण्याचा आवाज काही त्याची पाठ सोडत नव्हता. विचार कर करून शेवटी त्याचा मेंदू थकला आणि पहाटे पहाटे कधीतरी त्याचा डोळा लागला.

सकाळी गण्या नेहमी प्रमाणे आवरून शाळेला निघाला. आज पावसाचा मागमूस नव्हता, लख्ख ऊन पडले होते. पण कालचा हसण्याचा आवाज काही त्याच्या मनातून जात नव्हता. रस्त्यातला नेहमीचा पिंपळाचा पार आला आणि आज शाळेचा रस्ता बदलावा का, या विचारात असतांनाच त्याचे लक्ष पाराकडे गेले. पारा जवळ म्हादू काहीतरी शोधत असल्याचे त्याला दिसले. गण्याने पुढे होतं “म्हादबा सकाळी सकाळी काय शोधताय पारा जवळ?” “नमस्कार मास्तर. काल पासून मोबाईल हरवला आहे माझा.” “अहो मग घरी शोधा ना, इथे पाराजवळ कशाला….” “मास्तर, काल रात्री घरी मुलाच्या मोबाईल वरून कॉल करून बघितला, बेल वाजत्ये पण घरात कुठेच नाही मिळाला.” “पण मग तो पारा जवळ शोधायच कारण काय?” “मास्तर, आता वय झालं, काल आम्ही मित्र मंडळी इथंच पारावर गप्पा मारत होतो, तेवढ्यात पाऊस यायला लागला. माझ्याकडे छत्री नव्हती” “मग?” “मग मी माझा मोबाईल इथेच कुठे तरी ठेवला, पण तो नक्की कुठे ठेवला हे आठवत नाही बघा.” “अस्स ! मी काही मदत करू का तुम्हाला मोबाईल शोधायला?” “मास्तर तुमच्याकडे मोबाईल आहे ना?” “हो आहे ना” असं म्हणून गण्याने खिशात हात घालून आपला मोबाईल काढला. “हां, मास्तर आता एक काम करा.” “बोला म्हादबा.” “तुमच्या मोबाईल वरून मला फोन लावा बघू.” गण्याने म्हादबाने सांगितलेल्या नंबर वर फोन लावला आणि पिंपळाच्या झाडाच्या ढोलीतून कुणीतरी कालच्या सारखं हसल्याचा आवाज गण्याला आला ! त्या बरोबर “मिळाला, मिळाला” असं आनंदाने ओरडत म्हादबा त्या ढोली जवळ गेला आणि त्याने आतून आपला मोबाईल काढून गण्याला दाखवला, जो अजून जोर जोरात काल रात्री सारखं हसतच होता ! आणि ते हसणं ऐकून गण्या पण कधी हसायला लागला ते त्याच त्यालाच कळलं नाही !

 

© श्री प्रमोद वामन वर्तक

(सिंगापूर) +6594708959

मो – 9892561086

ई-मेल – pradnyavartak3@gmail.com

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ पंडित जितेंद्र अभिषेकी  -शास्त्रीय संगीतकार व गायक ☆ सौ. अर्चना सुरेश देशपांडे

सौ. अर्चना सुरेश देशपांडे

?  विविधा ?

☆ पंडित जितेंद्र अभिषेकी  -शास्त्रीय संगीतकार व गायक ☆ सौ. अर्चना सुरेश देशपांडे 

कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर….., चंद्र व्हा हो पांडुरंग अशा छान छान गाण्यांना संगीतबुद्ध करणारे व स्वतः गाणारे हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतकार व गायक जितेंद्र अभिषेकी यांचा जन्म 21 सप्टेंबर 1932 सालीझाला.

गोव्याच्या मंगेशीच्या देवळात शंकराच्या पिंडीवर अभिषेक करणाऱ्या नवाथे यांच्या अभिषेकी घराण्यात त्यांचा जन्म झाला. कीर्तनकार असलेल्या वडिलांकडे संगीताचे प्राथमिक शिक्षण झाल्यावर पुढे त्यांनी पंडित जगन्नाथ पुरोहित यांच्याकडे संगीताचे रितसर धडे घ्यायला सुरुवात केली. संगीताच्या शिक्षणासाठी त्यांनी गोवा सोडले आणि ते पुण्याला आले. पुण्यात अनाथाश्रमात राहून, वारावर जेवून, माधुकरी मागून ते शिकले. त्यांनी एकूण 21 गुरु केले व प्रत्येक गुरूकडून जेवढे पाहिजे तेवढेच घेतले. ते सारे संस्कार आत्मसात करून आपली स्वतंत्र गायन शैली त्यांनी निर्माण केली. प्रयोगशीलता हा त्यांच्या संगीत दिग्दर्शनातील महत्त्वाचा गुणधर्म. त्यांनी संगीत दिग्दर्शनात केलेले प्रयोग लोकांना खूप आवडले.. उदाहरण द्यायचे झाले तर मैलाचा दगड ठरलेल्या “कट्यार काळजात घुसली “या नाटकाची सुरुवात त्यांनी भैरवीने केली होती तर 1966 साली रंगभूमीवर आलेल्या” लेकुरे उदंड झाली”या नाटकात मुक्तछंदातल्या संवादांना आणि छंदाला प्राधान्य असलेल्या गोव्यातल्या “किरी स्तावांच्या  तियात्र “नाट्य प्रकारातल्या संगीताचा त्यांनी वापरला या नाटकात सगळ्यात पहिल्यांदा रेकॉर्डेड साऊंड ट्रॅक्स वापरले गेले. हे संगीत काळाच्या पुढे जाणारे होते. अभिषेकींनी स्वतःसंगीत दिलं तसं दुसऱ्यांच्या संगीत दिग्दर्शनातही ते गायले. आकाशवाणीसाठी केलेल्या ” बिल्हण “या संगीतिकेत पु.ल. च्या संगीत दिग्दर्शनात ते गायले. यातली गीते मंगेश पाडगावकर यांनी लिहिलेली होती तर” वैशाखवणवा” या चित्रपटासाठी दत्ता डावजेकर यांनी संगीत बद्ध केलेले “गोमू माहेरला जाते होनाखवा” हेगीत ही त्यांनी म्हटले. अनेक नाटकांना संगीत दिले.

एक चतुरस्त्र गायक, संगीतकार व संगीतज्ञ म्हणून प्रसिद्धी मिळवली. ते गोवा कला अकादमीचे सल्लागार व संस्कारभारतीचे सदस्य होते. त्यांनी चिपळूण येथील ७६ व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषविले होते.

त्यांची गाजलेली गानसंपदा….. अनंता तुला कोण पाहु…कबीर गुलाल उधळीत रंग..अभिरामा सुगंधाचा… अमृताची फळे… आम्हा न कळे ज्ञान… काटा रुते कुणाला.. कैवल्याच्या चांदण्याला….. गोमू माहेरला जाते हो.. तपत्या झळा उन्हाच्या..  दिवे लागले रे दिवे.. ध्यान करू जाता मन… प्परब्रम्ह भेटी लागी… पांडुरंग दाता.. बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल…. शब्दावाचुन कळले सारे.. सर्वात्मका सर्वेश्वरा… हरी भजना वीण  काळ… हे बंध रेशमाचे.. हे सुरांनो चंद्र व्हा..  हे दीपा तू जळत राहा… विकल मन माझे झुरत.. स्वप्नात पाहिले जेते राहूदे… चंद्रा लेणी तुझी रोहिणी.. जा उडुनी जा पाखरा… इत्यादी.

आपल्या संगीतातील कार्याने अजरामर झालेल्या पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी7 नोव्हेंबर 1998 रोजी जगाचा निरोप घेतला.अशा या थोर गायकाला विनम्र प्रणाम!

©  सौ. अर्चना सुरेश देशपांडे

पुणे

मो. ९९६०२१९८३६

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

 

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ सत्यनारायण पूजा : काळाची गरज – भाग 2 ☆ श्री अभय शरद देवरे

? विविधा ?

☆ सत्यनारायण पूजा : काळाची गरज – भाग 2 ☆  श्री अभय शरद देवरे ☆ 

पुढे चालू

देवाला नैवेद्य दाखवणे हा पूर्ण भक्तीयोग आहे. त्यातील विज्ञान योग कोणता ते पाहू.

गणपतीचा नैवेद्य ठरलेला. मोदक.

मोदकच का ?

गणेशांना आवडतो म्हणून !

का आवडतो ?

गणेश हा बुद्धीदाता आहे. आणि मोदकातील पुरण म्हणजे गुळ खोबरे आणि वर तूप हे काॅम्बिनेशन म्हणजे साक्षात बुद्धिवर्धक योग आहे. बूस्ट बोर्नव्हीटा, माल्टोव्हा, काॅम्प्लान इ. म्हणजे फक्त टीनचे डब्बे. बाकी त्यात सोयाबीनची टरफले, नारळाची भुशी आणि शेंगदाण्याचा चोथाच असतो. जर्रा जाहीरात दाखवायची खोटी, पडले तुटून त्या डब्यावर. हे जाहिरात तंत्र या कंपन्यांना बरोब्बर माहिती आहे, त्यामुळे जाहिरातींचा मारा करून, सचीन, कपील इ. ब्रॅण्डचा वापर केला की, आपले प्राॅडक्ट खपते. चोथा खाऊनच जर वजन वाढणार असेल तर मग असली नारळ आणि शेंगदाणेच का नकोत ? नारळ आणि शेंगदाणे खाऊन तब्येत सुधारत होती. घरच्या घरी बारा बारा बाळंतपणे होत होती. टाॅनिक म्हणून काय होते ? गुळ आणि शेंगदाणे. नारळ आणि गुळ. जो आपल्याकडे नैवेद्य म्हणून दाखवला जात होता आणि आमच्याच घरातील बाल हनुमान आणि बाल गणेशांना प्रसाद म्हणून मिळत होता. भक्तीपूर्ण नैवेद्याला, कोलेस्टेरॉलच्या भीतीने बदनाम केले गेले आणि जाणीवपूर्वक आरोग्याचा व्यापार सुरू झाला.

देवीला पुरणाचाच नैवेद्य लागतो.

पुरण म्हणजे चणे. हरभरे डाळ शिजवून गुळ घालून केलेले मनगणे असो वा कडबू असोत, पुरणाची पोळी असो वा नुसते पुरण असो, आणि या सर्व नाजूक नैवेद्यावर साजूक तूपाची धार…… फक्त ताकद वाढत होती. वेगळ्या टाॅनिकची गरज नव्हती. घोड्याला काय खाद्य दिले जाते ? हरभरेच ना ? घोड्यासारखी गती आणि वाजीकर शक्ती मिळवण्यासाठी तसेच तेच खाद्य आपल्याला मिळण्याची व्यवस्था आपल्या देवांच्या नैवेद्यामधून केलेली होती. गॅस वाढतो, पित्त वाढते, जाडी वाढते म्हणून जेवणातून चणाडाळच हद्दपार केली आणि प्रोटीन पावडरचे डब्बे मात्र जिममधे खपवले जाऊ लागले. हे कधी लक्षातच आले नाही.

नागपंचमीला नागोबाला लाह्या, हळदीच्या पानात लपेटलेल्या पातोळ्या, पानगे, गोकुळाष्टमीला शेवग्याच्या पाल्याची भाजी, कोजागिरीला आटीव दूध, गुढीला श्रीखंड, हे नैवेद्य आरोग्य रक्षण करणारेच होते. नारळीपौर्णिमेला नारळीभात ठरलेलाच. नारळावरूनच ओळखली जाणारी ही पौर्णिमा!

वेगवेगळ्या ऋतुमधे येणारे वेगवेगळे सण, आणि या निमित्ताने होणारे नैवेद्य हे जणु काही आरोग्याचे बूस्टर डोसच होते. दरवर्षी नियमाने घ्यायचे आणि आरोग्य सांभाळायचे !

या लेखाच्या अनामिक लेखकाचे आभार मानावे तेवढे थोडेच !

मलाही जाणवले की इतरवेळी नाश्त्याला शिरा असतो तोच पूजेच्यावेळी प्रसाद बनतो. कसे माहीत नाही पण तेच पदार्थ वापरून तीच गृहलक्ष्मी जेंव्हा शिरा हा प्रसाद म्हणून बनवते तेंव्हा त्याची चव वेगळी लागते. कारण त्यात भक्ती उतरलेली असते. बाकी वर्षभर शिरा हा प्रसादासारखा कधीही लागत नाही.

सत्यनारायणाच्या पूजेत आवर्जून तीर्थ म्हणून दिले जाणारे पंचामृत हे शेतात बायोकल्चर म्हणून वापरले जाऊ शकते याची कल्पना आहे ? साता-यातील एक अवलिया शास्त्रज्ञ श्री शेखर कुलकर्णी यांनी त्यावर एक प्रयोग केला. त्यांनी आपल्या गच्चीवरील मातीविरहित बाग पंचामृताच्या साहाय्याने तयार केली. दूध, दही, साखर, मध आणि तूप हे एकत्र करून पंचामृत तयार केले. श्री. कुलकर्णी यांनी एका कुंडीत सर्वात खाली नारळाच्या शेंड्या टाकल्या. त्यावर दोन चमचे पंचामृत टाकले. त्यावर घरातला ओला कचरा टाकून पुन्हा दोन चमचे पंचामृत टाकले. असेच दोन थर तयार करून एक झाड सोबत असलेल्या मातीसहीत लावले. पुढील २१ दिवसात पंचामृताने कच-याचे विघटन केले आणि झाड तरारून वाढले. त्यानंतर त्यात रोजचा कचरा टाकून झाडाला वाढवले. अशा प्रकारे त्यांनी गच्चीत अनेक झाडे फुलवली आहेत. पूर्वी पंचामृत हे तुळशीच्या झाडाखाली टाकले जाई. आणि तुळशिखालील माती ही गांधीलमाशी किंवा मधमाशी चावल्यावर औषध म्हणून लावली जाई. याचा अर्थ पंचामृत हे ख-या अर्थाने अमृत आहे हे आपल्या पूर्वजांना माहीत होते.

सत्यनारायणाची पूजा मला सर्वात जास्त का आवडते ते सांगू ? या पूजेच्या निमित्ताने एकाच दिवशी जवळजवळ शंभर परिचित घरी येतात आणि घर हे घरासारखे वाटते. इतरवेळी कोणालाही घरी यायचे निमंत्रण द्या, आपण बोलावतो, लोक हो म्हणतात पण येतीलच याची खात्री नसते. पण तिर्थप्रासादाला या असे सांगितले तर आवर्जून सहकुटुंब येतात. देवाचे दर्शन घ्यायचे असल्याने कोणाच्याही मनात दुस-याबद्दल वाईट विचार नसतात. ती एक प्रसन्न संध्याकाळ असते. सर्वाना एकप्रकारची पॉझिटिव्ह ऊर्जा मिळते. ती दिसत नाही, दाखवता येत नाही पण अनुभवता मात्र जरूर येते. आजच्या तरुण पिढीला पाच हजार फेसबुक फ्रेंड असतात पण व्यक्तिगत जीवनात भेटणे, बोलणे हे त्यांना आवडत नाही. सत्यनारायणाच्या पूजेच्या निमित्ताने त्यांना घडलेला माणसांचा सहवास हा त्यांना नक्कीच आयुष्यात उपयोगी पडतो.

एक छोटीशी पूजा, पण एवढा मोठा अर्थ सांगून जाणारी ! लोकांना एकत्र आणणारी ही पूजा काळाची गरज नव्हे काय ? आज प्रत्येकजण एकमेकांपासून शरीराने आणि मनाने दूर गेलाय. त्यामुळे आजपर्यंत नव्हती इतकी गोष्टींची गरज निर्माण झाली आहे. कोणाला पटो किंवा न पटो, या धार्मिक रूढी, परंपरा लोकांमधला आपपरभाव नाहीसा करून मानवतावाद शिकवतात. मग टीकाकार काहीही म्हणोत.

मुळात हिंदू धर्म आणि आपण म्हणजे हत्ती आणि सात आंधळे यांच्या गोष्टींसारखे आहोत. जशी ज्याची नजर तसे त्याचे आकलन ! कोणत्याही धर्मावर टीका करणे खूप सोपे आहे कारण त्या टीकेसाठी खूप बुद्धी लागत नाही, फक्त मनात द्वेष असला म्हणजे झाले. मला नेहमी प्रश्न पडायचा की हिंदू धर्मालाच का इतके टार्गेट केले जाते ? विचाराअंती लक्षात आले की लोक फळांनी डवरलेल्या झाडालाच दगड मारतात, वठलेल्या किंवा काट्यांच्या झाडाला नव्हे ! तसेच हेही…….

क्रमशः….

© श्री अभय शरद देवरे

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ सत्यनारायण पूजा : काळाची गरज – भाग 1 ☆  श्री अभय शरद देवरे

? विविधा ?

☆ सत्यनारायण पूजा : काळाची गरज – भाग 1 ☆  श्री अभय शरद देवरे ☆ 

नुकतीच घरी सत्यनारायणाची पूजा यथासांग पार पडली. ही पूजा गेल्या कित्येक वर्षांपासून दर श्रावणात आणि मंगल कार्य झाल्यावर आमच्या घरात केली जाते. इतक्या वर्षात ती अंगवळणीही पडली आहे पण सोशल मीडियावर व्यक्त होणे जसे सोपे झाले तसे हिंदू धर्मावरील जहरी फुत्काराना उधाण आले.काही महाभाग तर केवळ त्या एका उद्दिष्टासाठीच जगू लागले. ( त्यांना त्यासाठी पैसे मिळत असावेत बहुतेक ) श्रावणापासून सुरू झालेले सण धुलीवंदनाच्या दिवशी संपतात पण सन्माननीय टीकाकार मात्र वर्षभर या सणांवर टीका करण्याचे इतिकर्तव्य वर्षभर पार पाडतात. कॉपीपेस्ट केलेल्या म्हणजेच चोरलेल्या या पोस्ट एखाद्या संसर्गजन्य आजाराप्रमाणे सर्वत्र पसरतात. त्यात मांडलेले मुद्दे इतके प्रभावी असतात की माझ्यासारख्या श्रद्धेय माणसाच्याही श्रद्धा डळमळीत होऊ पहातात. हिंदू धर्म म्हणजे जातीयवादी, परंपरावादी, स्पृश्यास्पृश्य मानणारा, एका विशिष्ठ समाजाच्या हातात सर्व अधिकार ठेवणारा अशा अनेक शेलक्या शेलक्या विशेषणांनी संभावना केली जाते. कोण तो मनू….जो  काळा का गोरा हे माहीत नसतो किंवा त्याचा तो कुप्रसिद्ध मानला गेलेला ग्रंथ मुळापासून संस्कृतमधून वाचणे तर सोडाच पण साधा पाहिलेलाही नसतो, तरी पण त्याच्यावर आणि त्याला चिकटवलेल्या जातीवर, पीएचडी केल्यासारखे असंख्य महामहोपाध्याय तुटून पडतात. तेंव्हा असे वाटून जाते की खरेच आपला धर्म इतका वाईट आहे का ?

मग मी माझ्या अल्पबुद्धीने या धर्मातील रूढी परंपरांमागचा विचार जाणून घेण्याचा प्रयत्न करतो. विचार करु लागलो की कोडी सहजपणे सुटत जातात आणि माझ्या प्राणप्रिय धर्माची महानता समजू लागते. दरवर्षी घरात होणारी सत्यनारायणाची पूजा हीसुद्धा अशीच एक आदर्श परंपरा आहे. मला माहित नाही की सत्यनारायण या नावाचा देव खरच आहे का ते ! मला माहित नाही की तो साधुवाणी, कलावती किंवा लीलावती ही पात्रे खरेच होती का ? मला माहित नाही की हे व्रत न पाळल्यामुळे देव शिक्षा करतो का ते ! तरीही मी पूजा करतो कारण त्यातून मिळणारे आत्मिक समाधान मला शब्दात वर्णन करता येत नाही पण अनुभवता मात्र जरूर येते.

नेमके प्रत्येकाच्या घरात काय घडते जेंव्हा सत्यनारायणाची पूजा केली जाते तेंव्हा ? पूजा होणार म्हणून दोन दिवस अगोदर गृहिणी घराच्या साफ़सफाईला लागते. जाळेजळमटे, अडगळ काढून टाकली जाते. स्वच्छतेतून निर्माण होणारी धार्मिकता घरात वावरू लागते. पूजेसाठी लागणारे साहित्य खरेदीविक्रीतून आपोआपच मार्केटमध्ये पैसे फिरू लागतो. गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, दसरा, दिवाळी हे सण अनेक लोकांना अन्नाला लावतात. सत्यनारायणाची पूजा हीसुद्धा त्याला अपवाद नाही. ही पूजा जर कोणी नाही केली तर फुले, फळे, सुपारी, हळद, नारळ, तांदूळ, गहू, रवा, साखर दूध, आदी उत्पादकांना त्याकाळात वाढीव ग्राहक मिळणार नाही.

पूजेसाठी लागणा-या दुर्वा, पत्री, प्रसाद यांचे केवळ धार्मिक महत्व नाही तर या सगळ्या गोष्टींचा औषधी उपयोग आहे. म्हणूनच शास्त्रकारांनी पूजेत वापर करायला सांगितला आहे. हिंदू धर्मातील कोणतीही रूढी, परंपरा ही माणसाला निसर्गाच्या जवळ नेते आणि निसर्गाचे संवर्धन करायला शिकवते. पूजेनंतर वाटला जाणारा प्रसाद हा अनारोग्यातून आरोग्याकडे जाणारा एक राजरस्ताच आहे. प्रसाद भक्षण करून आपण विविध रोगांना आपले भक्ष्य बनू देत नाही हे आपल्या लक्षातच येत नाही. सोशल मीडियावर एक लेख आला होता तो जसाच्या तसा समोर ठेवत आहे.

देवाला नैवेद्य दाखवणे हा पूर्ण भक्तीयोग आहे. त्यातील विज्ञान योग कोणता ते पाहू.

क्रमशः….

© श्री अभय शरद देवरे

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ साप्ताहिक स्तम्भ – हे शब्द अंतरीचे # 48 ☆ फुलपाखरू… Butterfly ☆ कवी राज शास्त्री

कवी राज शास्त्री

?  साप्ताहिक स्तम्भ – हे शब्द अंतरीचे # 48 ? 

☆ फुलपाखरू… Butterfly ☆

फुलपाखरू… किती निर्मळ आणि स्वच्छंदी जीवन असतं त्याचं…, जीवशास्त्र हे सांगतं की फुलपाखराचे आयुमान फक्त चौदा दिवसाचं असतं… तरी सुद्धा ते किती आनंदात जगतांना आपल्याला दिसतं… या फुलावरून त्या फुलावर लीलया उडतं, जीवन कसं जगावं याचा परिपाठ जणू ते सर्वांना शिकवत असतं…आपल्याच विश्वात रममाण असणारं हे फुलपाखरू खरेच एक आदर्शवादी कीटक आहे… वास्तविकता त्याला पण खूप शत्रू परंपरा लाभलेली आहे, तरी सुद्धा तो आपला जीवनक्रम विना तक्रार पूर्ण करतं… या उलट शंभर वर्ष वयाचा गर्व असणाऱ्या माणसाला नेहमीच आपल्या कार्याचा, आपल्या नावाचा, आपल्या पदाचा गर्व असतो, तो त्या गर्वातच संपून सुद्धा जातो… अहो शंभर वर्ष आयुष्य जरी माणसाचं असलं, तरी मनुष्य तितका जगतो का…? यदाकदाचित एखादा जगला तरी… ” वात, कफ, पित्त…”  हे त्रय विकार त्याला शांत जीवन जगू देतात का…? अगणित विकार उद्भवुन लवकर मरण यावे म्हणून हा मनुष्य देवाला साकडं घालत असतो… मग काय कामाचं ते शंभर वर्षाचं आयुष्य. आणि म्हणून मला फुलपाखरू खूप आणि खूपच आवडतं… *( short but sweet life… )

एक चांगला गुरू म्हणून मी त्याकडे नेहमी पाहतो, जीवन जगण्याची कला मी त्याकडूनच अवगत केलीय… जेव्हा जेव्हा मी उदास होतो, मला कंटाळा येतो, तेव्हा मी फुलपाखराला आठवतो… मला एक लहानपणी कविता होती, फुलपाखरू छान किती दिसते, फुलपाखरू… आणि तेव्हापासून त्याची आणि माझी घट्ट मैत्री झाली आहे…

My dear friend the butterfly… forever 

शेवटी एकच सांगावे वाटते की इथे आपले काहीच नाही, सर्व सोडावे लागणार आहे, मग कशाला उगाचच व्यर्थ गर्व करून रहावं… प्रेम द्या प्रेम घ्या, आणि प्रेमानेच मग मार्गस्थ ही व्हा…!

 

© कवी म.मुकुंदराज शास्त्री उपाख्य कवी राज शास्त्री.

श्री पंचकृष्ण आश्रम चिंचभुवन, वर्धा रोड नागपूर – 440005

मोबाईल ~9405403117, ~8390345500

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ ज्येष्ठतेचा ‘देहशतवाद’.. ☆ सुश्री वैशाली पंडित

? विविधा ?

☆ ज्येष्ठतेचा ‘देहशतवाद’.. ☆ सुश्री वैशाली पंडित ☆ 

(मजेशीर हलका फुलका लेख जरूर वाचा)

ज्येष्ठ नागरिक या इयत्तेत प्रवेश केला की पहिल्या दिवसापासूनच सावध रहावं लागतं.आता मागच्या इयत्तांतल्या पाठ्यपुस्तकांचा अर्थातच काय्येक उपयोग नाही. नवा अभ्यासक्रम, नवनवीन चाचणी परीक्षा, त्याही ठराविक वेळापत्रकानुसार वगैरे फाजील लाड नाहीत. अचानक परीक्षा जाहीर की बसा सोडवत पेपर. अभ्यास चांगला झालेला असेल तर व्हालच पास. अन्यथा भोगा…!

तर ‘ज्येष्ठ’ झाल्यावर ‘ताबा’ हा पहिला धडा सतत पाठ करावा लागतो.बरं तो नुसता घोकंपट्टी करून नव्हे; तर आचरणात आणावा लागतो तरच आरोग्याच्या सीमेवरचे सैनिक आपलं रक्षण करतात.

कसला ताबा ?

कुणावर ताबा ?

 अर्थातच  पहिला ताबा जिभेवर !

 आत्तापर्यंत काय खाल्लं काय पचवलं, काय नाही पचवलं याचा सव्याज हिशेब फेडायची वेळ आलेली असते.ज्येष्ठत्व आता आहारातही दिसणं सक्तीचं असतं. मनाला येईल तेव्हा हाणायचे दिवस मागे पडले.आपल्याला काय आणि किती खाल्लेलं पचतं हे स्वतःला प्रामाणिकपणे विचारूनच ठरवावं लागतं.

” ओ, आता अरबटचरबट खाणं बंद करा.”

” आता आम्हाला सांगायची वेळ आणू नका तुम्ही खाण्यावरून.”

असे सल्ले आपल्या मुलाबाळांकडून ऐकणं कमीपणाचं वाटत असेल तर मुळात तशी वेळच का आणा आपण ?

दुसरा ताबाही जिभेवरचाच.पण तो मिताहाराबरोबरच मित शब्दांचा.

खूप काही शेकडो, सहस्र, लाखो, अनंत गोष्टी खटकू लागलेल्या असतात आता.अगदी फडाफड सुनवावं नि सरळ करावं एकेकाला असं वाटत असतं… कबूल… पण सबूर… आता मनात आलेले विचार आणि तोंड यांच्यात एक बारीक जाळीची चाळणी फिट करून घ्यायची.म्हणजे मनातले शब्द बुळुक्कन बाहेर येणार नाहीत.तारतम्याने चाळूनच शब्दयोजना व्हायला हवी.

तीही आवश्यकता भासली तरच ! उगाचच मुलाबाळांच्या ज्यात त्यात आपलं नाक खुपसून तोंडाची चाळण उघडायची नसतेच मुळी.

विचारला(च समजा ) सल्ला तर मनापासून द्यावा पण तो ऐकावाच असा आग्रह बिल्कूल धरू नाही.त्यावरून रूसू रागवून आपली शोभायात्रा तर मुळीच काढून घेऊ नाही.

ज्येष्ठ ‘अगं’ ना निदान घरकामातल्या लुडबुडीचा थोडा तरी विरंगुळा असतो.पण ‘ अहों ‘ ना तोही नसतो.रिकामपणत्यांना त्रास देतं नि अहो अगंना छळतात.नको जीव करतात.अहो आणि अगंना आता एकमेकांच्या दुख-या नसा पुरत्या माहीत झालेल्या- असतात.अशा वेळी दोघांनी गुण्यागोविंदाने भांडत बसावं.एकमेकांच्या औषधपाण्याची मधूनच भांडणाच्या एपिसोडमध्ये ब्रेक घेऊन आठवण करावी.

दुर्दैवाने एकटा जीवच या इयत्तेत असेल तर मात्र स्वतःचा अभ्यासक्रम स्वबळावरच पूर्ण करावा लागतो.त्यासाठी स्वयंसमुपदेशनाची सवय लावून घ्यावी लागते.

आता शरीर आपल्याकडे कर्जफेडीचा तगादा लावत असतं.तिकडे प्राधान्याने लक्ष द्यावं लागतं.

चालतानाही प्रत्येक पाऊल अत्यंत सावधगिरीने टाकावं लागतं.वा-यावर उधळून घेणा-या तरूणपणासारखं आता किधर भी देखना न् किधर भी चलना चालतच नाही.चालता चालता आता इकडे तिकडे बघायचे दिवस संपलेले आहेत.पायांकडची नजर हटी तो दुर्घटना घटीच समजा.

देह नावाचा प्राणी आता त्याच्याकडेच…त्याच्याकडेच्च लक्ष द्यावं म्हणून हटून बसलेला असतो.

लहरी झालेला असतो. त्याची लहर केव्हा, कशी फिरेल हे खुद्द आपल्यालाही कळत नसतं.

त्या देह नावाच्या प्राण्याच्या प्रत्येक अवयवाची मिजास आता पुरवावी लागते.

आत्ता आत्तापर्यंत सुरळीत असणारा एखादा बारकुस्सा स्नायूसुद्धा कधी तुम्हाला वेठीला धरील सांगता येता नाही.सुखासुखी बसलेलो असताना उठताना कमरेतून सणकच काय येईल, पोटरीतून वळच काय येईल,मस्तकातून भिरभिरंच काय फिरेल काय काय मजामजा होईल काही विचारायचं कामच नाही.

प्रत्येक हालचाल करताना मुळी आता त्या त्या अवयवाची परमिशन घेतल्याशिवाय चालणारच नाही ते !

पायांनो, उठून उभं राहू का ?मानेबाई,मागे वळून बघितलं तर चालेल का ?*

दंडाधिका-यांनो, जिन्याच्या कठड्याला जोरात धरलं तर तुमची काही हरकत नाही ना ?

दंतोपंत, कणीस खाताना त्यातच नाही ना मुक्काम करणार ?

अगदी हातापायांच्या चिरमुटल्या करंगळ्याही वरपक्षाकडच्या करवल्यांसारख्या मिजाशीत मुरडतात कधीकधी.

असे देहाचे लळे आता पुरवावेच लागतात; नाहीतर तो ‘देहशतवाद’ आपल्या जगण्याचा सगळा नकाशाच बदलून टाकू शकतो.वेगवेगळ्या व्याधींची अफाट शस्त्रसेना आणि असहाय्यतेचा दारूगोळा त्याच्या पोतडीत ठासून भरलेला असतो.

हे सगळं  त्या इयत्तेतच जायच्या आधीच माहीत करून घेतलं तर या असल्या देहशतवादाशी सामना करावाच लागणार नाही.पटतंय ?

 

सुश्री वैशाली पंडित

(व्हाॅटस्अॅप वरून साभार)

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ बुध्दीबळ शास्त्र आणि ज्योतिष शास्त्र ☆ श्री अमोल अनंत केळकर

श्री अमोल अनंत केळकर

? विविधा ?

☆ बुध्दीबळ शास्त्र आणि ज्योतिष शास्त्र ⚜️ ☆ श्री अमोल अनंत केळकर ☆ 

मंडळी नमस्कार, ?

 

बुद्धीच्या देवतेचा सध्या उत्सव सुरु आहे. कुठलाही कलाकार मग तो गायक, अभिनेता, नर्तक, वादक, चित्रकार ,लेखक,कवी असू  दे

वर्षातील एकदा तरी आपली कला कलेची देवता श्री गजानना चरणी सादर करावी हे सर्वच कलाकारांना मनोमन सांगणे.  गणेशोत्सव ही या सगळ्यांसाठी विशेष पर्वणी.

 

याच उद्देशाने माझ्या बुध्दीच्या कुवती नुसार लिहिलेला  हा लेख बाप्पाला अर्पण  ?

 

तर मंडळी, लहानपणा पासून असलेली  बुध्दीबळाची आवड आणि वयाच्या एका टप्प्यावर लागलेली ज्योतिष विषयाची गोडी आणि आज या दोन्ही क्षेत्रातले बेसिक नाॅलेज यावरून या दोन्ही गोष्टींची तुलना, काही समान धागे जोडण्याचा केलेला हा प्रयत्न

 

पटावरील ६४ घरांमधे रंगणारे दोघांमधील युध्द आणि पत्रिकेतील १२ भावांमधे असणा-या जन्मकालीन ग्रहांशी गोचरीने होणारे ग्रहयोग ( नियतीने टाकलेले डाव ) हे माझ्यासाठी  कायमच उत्सुकतेचे विषय राहतील

पटांवरील प्रत्येक सोंगटी आणि पत्रिकेतील प्रमुख ग्रह यांची मी अशी बरोबरी केली आहे

 

रवी – राजा ??

आत्म्याचा कारक ग्रह – रवी

पटावर ज्याच्या साठी खेळ रंगतो  तो राजा

दोघांनाही चेक बसला, सोडवता नाही आला तर खेळ खल्लास

 

मंगळ / वझीर ?

मंगळाला सेनापती म्हणले आहे, वझीर हा पटावरचा खरा सेनापती

 

शनी / घोडा ?

अडीच + अडीच + अडीच = शनीची साडेसाती आणि घोड्याची पटावरील अडीच घरांची चाल.

कधी कुणाला … ? ( असो)

सळो की पळो करुन सोडेल,  गर्व हरण करेल सांगता यायचे नाही

 

हत्ती / गुरु ? ?

पटावर  राजा पासून सगळ्यात लांब असणारा,  अगदी सरळ मार्गी असणारा,   पण वेळोवेळी राजाला मार्गदर्शन करणारा हत्ती , आणि पत्रिकेतील गुरु सारखेच

 

कॅसलीन रूपाने  राजाची हत्तीशी  होणारी सल्लामसलत, मार्गदर्शन आणि वेळप्रसंगी गरज लागलीच तर मैदानात उतरणारा हत्ती म्हणजे पटाला लाभलेले गुरुबळच.

 

दोन उंट – बुध/ शुक्र ???

हे दोन्ही ग्रह अशुभ ग्रहात येत नाहीत पण अनेक वेळा यांची पत्रिकेतील स्थिती जपून अभ्यासावी लागते. वक्री, स्तंभी, उच्च-निच्च ग्रह केंव्हा तिरपी चाल चालवून धोक्याची घंटा वाजवतील हे सांगणे अवघड

 

प्यादी / चंद्र ?♟️

संख्येने जास्त असणारी प्यादी,  आणि  पत्रिकेत विविध कला दाखवणारा चंद्र यात कमालीचे साम्य आहे. राशी, नक्षत्र,  दशा, प्रश्णकुंडलीतील चंद्राचा भाग, इतर ग्रहांशी जमणारी केमिस्ट्री याबरोबरच मनाचा कारक ग्रह चंद्र

 

मूर्ती लहान पण कीर्ती महान. याच मनाच्या खंबीरतेवर प्रतिस्पर्ध्याच्या पहिल्या घरात पोचून प्यादाचा वजीर बनू शकतो जे इतर कुणालाही शक्य नाही.

इतर सोंगट्यांना सगळ्यात जास्त सपोर्ट हे प्यादे देते. धारातीर्थी ही पहिल्यांदा तेच पडते तर वजीर बनून पोर्णीमा ही अनुभवते

 

मंडळी , कशी वाटली तुलना?  आयुष्यात बुध्दीबळाचे अनेक डाव तुम्ही खेळता कधी जिंकता कधी हरता. पण पत्रिकेत ग्रहांचा जन्मत: सुरु झालेला डाव तुमच्या अंतापर्यंत सुरु राहतो. त्यात काही लढाया नियती तुम्हाला जिंकवते  काही  डावपेचात हरवते. इथे नियतीच फक्त  खेळत असते, आपल्यासाठी..

 

लेखनाचा शेवट भाऊसाहेब पाटणकरांची एक गझल थोडीशी बदलून

 

क्षणाक्षणाला रचती डाव

खेळ असे हे रंगलेले

शौर्य-बुध्दीचे प्रारब्ध त्यांच्या

पट-पत्रिकेवर दिसलेले

कधी असते खेळलेले

कधी असते ठरलेले

 

मोरया ??

अमोल

१२/०९/२१

भाद्रपद. शु षष्ठी।

©  श्री अमोल अनंत केळकर

बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

poetrymazi.blogspot.in, kelkaramol.blogspot.com

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ शिवाजी सावंत स्मृतीदिन विशेष – मृत्युंजयकार ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे

सौ.ज्योत्स्ना तानवडे

?  विविधा ?

☆ शिवाजी सावंत स्मृतीदिन विशेष – मृत्युंजयकार ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे ☆ 

मराठीतील आपल्या पहिल्याच पौराणिक कादंबरीने इतिहास घडविणारे सुप्रसिद्ध कादंबरीकार म्हणजे शिवाजीराव सावंत. कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा गावी ३१ ऑगस्ट १९४० ला त्यांचा जन्म झाला. शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या शिवाजीरावांचे शालेय शिक्षण गावातच झाले. ते उत्कृष्ट कबड्डीपटू होते. महाविद्यालयीन शिक्षण अर्धवट सोडून ते कोल्हापूरात नोकरीला लागले.

कोल्हापूरच्या राजाराम प्रशालेत काही वर्षे अध्यापनाचे काम केले. तेथून पुण्यात येऊन महाराष्ट्र शासनाच्या ‘ लोकशिक्षण ‘ मासिकाचे सुरवातीला सहसंपादक आणि नंतर संपादक म्हणून काम पाहिले.

भारतीय जीवन आणि संस्कृती याबद्दल त्यांना सुरुवातीपासून सार्थ अभिमान होता. ‘ माझा भारत म्हणजेच महाभारत’, हे समीकरण एकदा मनात रुजल्यावर अभ्यासूवृत्तीने त्यांनी महाभारताचा सखोल व्यासंग सुरू केला.या अभ्यासातून अस्मिता विसरू पहात असलेल्या समाजपुरुषाला सूर्यपुत्र, ‘ मृत्युंजय ‘ कर्ण आपत्तीतही धैर्यशाली आणि तेजस्वी बनवेल असे उत्तर त्यांना मिळाले. मग प्रदीर्घ संदर्भशोधन, सखोल व उलटसुलट चिंतन-मनन आणि डोळसपणे टिपलेले निरीक्षण यातूनच रससंपन्न अशा प्रदीर्घ कादंबरीचा जन्म झाला . मृत्युंजयच्या लिखाणासाठी त्यांनी थेट कुरूक्षेत्रात मुक्काम ठोकला होता. अत्यंत सत्प्रवृत्त,समर्पणशील, स्वाभिमानी अशा कर्णाच्या व्यक्तिमत्त्वाची तितकीच गौरवास्पद प्रकाशमय बाजू या कादंबरीत मांडली आहे.

‘मृत्युंजय ‘ही १९६७ साली लिहिलेली त्यांची पहिलीच कादंबरी.या कादंबरीला वाचकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. त्यांच्या नावाला प्रसिद्धी मिळाली आणि ‘ मृत्युंजयकार ‘ हीच ओळख कायम झाली.

कादंबऱ्यात मानदंड ठरलेल्या या कादंबरीला अनेक संस्थांचे पुरस्कार मिळाले. १९८६ साली कलकत्त्याच्या ‘ विवेक संस्थान ‘ या बंगाली वाचकांच्या संस्थेने ‘ पूनमचंद भुतोडिया ‘ हा सर्जनशील साहित्याचा पुरस्कार देऊन सन्मान केला. दिल्लीतील भारतीय ज्ञानपीठ या संस्थेने १९९५ सालचा बारावा ‘ मूर्तिदेवी पुरस्कार ‘भारताचे उपराष्ट्रपती डॉ. के. आर. नारायणन यांच्या हस्ते देऊन सावंतांना सन्मानित केले.हा अत्यंत मानाचा पुरस्कार मिळवणारे सावंत हे एकमेव मराठी साहित्यिक आहेत.

‘ मृत्युंजय ‘ च्या एकतिस आवृत्त्या निघाल्या. हिंदी, कन्नड, गुजराथी, मल्याळम अशा अनेक भाषांमध्ये भाषांतर झालेले आहे.इंग्लिशमधील भाषांतराने मूळ मराठी कर्णगाथा आंतरराष्ट्रीय साहित्यात समाविष्ट झाली. तिच्या गुजराथी भाषांतराला ‘गुजराथ साहित्य अकादमी’ पुरस्कार आणि पुढे ‘केंद्रीय साहित्य अकादमी’ पुरस्कारही प्रदान करण्यात आला.

सावंतांनी कादंबरी, चरित्रलेखन, व्यक्तिचित्रे, ललित निबंध असे विविध प्रकारचे कसदार लेखन केले.

सावंतांची छत्रपती संभाजीराजांच्या जीवनावर लिहिलेली ‘ छावा’ ही कादंबरी पण खूपच वाचकप्रिय ठरली.तिचाही हिंदी अनुवाद प्रसिद्ध झाला.ही कादंबरी पण महाराष्ट्र राज्य पुरस्काराची मानकरी ठरली.

सावंतांनी लिहिलेले ‘मृत्युंजय’ नाटक चंद्रलेखा या नाट्यसंस्थेने रंगभूमीवर पुरे एक तप सादर केले. तसेच ‘ छावा’ हे नाटकही त्यांनीच सादर केले.दोन्हीही नाटके खूपच रसिकप्रिय होती.

भारतीय समाजमनातीला एक आदर्श व्यक्तिमत्व असणाऱ्या योगयोगेश्वर श्रीकृष्णाच्या चरित्रग्रंथावर ‘ युगंधर ‘ ही कादंबरी त्यांनी सिद्ध केली.या कादंबरीचाही हिंदी अनुवाद प्रकाशित झाला.

भव्योदात्त जीवनाबद्दल त्यांना वाटणारा आदर आणि ओढ मृत्युंजय, युगंधर,छावा या पुस्तकातून उत्कटतेने प्रकट होते. शब्दब्रह्माचे वरदान लाभलेल्या त्यांच्या लेखणीतून अत्यंत ओजस्वी शब्द सुमनांनी ही व्यक्तिमत्त्वे साकारताना हिऱ्याला जणू सुवर्ण कोंदणच लाभले.

त्यांनी लिहिलेली पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे-पाटील यांची ‘ लढत ‘ ही चरित्र कहाणी, भाई मनोहर कोतवाल यांची ‘ संघर्ष ‘ ही चरित्र कहाणी आणि माननीय पी. के. अण्णा पाटील यांच्यावरील ‘पुरुषोत्तम नामा ‘ ही चरित्र कहाणी प्रकाशित झालेली आहे.

‘अशी मने असे नमुने ‘, ‘मोरावळा’ ही व्यक्तीचित्रे प्रसिद्ध आहेत. १९८३ साली ते बडोदा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते.

असा हा सिद्धहस्त लेखक दि.१८सप्टेंबर २००२ ला आकस्मिकपणे आपल्यातून निघून गेला. तरीही त्यांच्या अजरामर कलाकृतीतून ते सदैव साहित्य दरबारात वास करणार आहेत. त्यांना विनम्र अभिवादन. ?

© सौ.ज्योत्स्ना तानवडे

वारजे, पुणे.५८

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ शिवाजी सावंत स्मृतीदिन विशेष – स्मरण मृत्युंजयकारांचे…. ☆ श्री आनंदहरी

❤️ जीवनरंग ❤️

☆ शिवाजी सावंत स्मृतीदिन विशेष – स्मरण मृत्युंजयकारांचे…. ☆ श्री आनंदहरी ☆

आपल्या शब्दसाहित्याने मृत्युवर जय मिळवलेल्या , अजरामर झालेल्या,मृत्युंजयकार शिवाजी सावंत यांचा आज स्मृतीदिन . 

जीवनातील काही आठवणी या अमिट असतात. त्यातही बालपणातील, शालेय जीवनातील काही आठवणी तर आपण काळीज-कोंदणात जपून ठेवत असतो.. अशीच एक आठवण मृत्युंजयकार यांना पाहिल्याची, भेटल्याची आणि ऐकल्याची.

१९७२-७३ चे शैक्षणिक वर्ष. न्यू इंग्लिश स्कुल ,पेठ मध्ये आठव्या इयत्तेत शिकत होतो. शालेय वय हे संस्कारक्षम वय.. ओल्या मातीला हवातसा आकार देण्याचे वय.. आणि म्हणूनच असेल शाळेमध्ये विविध कारणांनी साहित्यिक, कलाकार यांना विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासाठी बोलावण्याची परंपरा शाळेने जोपासलेली. त्या परंपरेनुसार शाळेत मृत्युंजयकार शिवाजी सावंत यांना निमंत्रित केलेले. ते त्यावेळी राजाराम हायस्कुल, कोल्हापूर येथे शिक्षक होते. मृत्युंजय कादंबरी प्रचंड गाजलेली होती, गाजत होती पण तरीही ते पेठ सारख्या ग्रामीण भागातील शाळेत आलेले.

त्यावेळी जे.के.दैव हे इतिहासाचे शिक्षक होते.साहित्य, नाटक यांची प्रचंड आवड असणारे.. रसिक वाचक म्हणून मृत्युंजयकारांचे मित्र असलेले. त्यांनी त्यांना आमंत्रित केले होते. लष्करातील अधिकाऱ्यासारखे रुबाबदार व्यक्तिमत्व असणाऱ्या शिवाजी सावंतांचे प्रथम दर्शनच आदर निर्माण करणारे.. प्रेमात पडणारे.

शाळेच्या ग्रंथालयात ‘मृत्युंजय ‘ होतीच. माझ्यासह काही विद्यार्थ्यांनी त्यावेळच्या आकलनशक्ती नुसार वाचलेली आणि कार्यक्रमाच्या अगोदरच काही दिवस पाहुण्यांचा सविस्तर परिचय करून देण्याच्या शाळेच्या प्रथेनुसार सर्व विद्यार्थी वर्गाला परिचित झालेली व्यक्ती समोर पाहून मनात आनंदघन बरसू लागलेले.

मृत्युंजयकार बोलायला उभे राहिले. शब्द जणू जिव्हेवर येण्यासाठी आतुर झाले असावेत अशी ओघवती, काळजाला साद घालणारी भाषा.. त्यांचे बोलणे आणि आपले ऐकणे संपूच नये असे प्रत्येकाला वाटायला लावणारे वक्तृत्व. त्यांनी मृत्युंजयचा सारा निर्मिती प्रवास कथन केला.. कुरुक्षेत्राचा त्यांनी केलेला प्रवास, कर्णाबद्दलच्या लोककथा, दंतकथा, काही ग्रंथांचा अभ्यास, चिंतन, मनन ते विदित करत होते आणि आम्ही सर्व सहप्रवासी झालो होतो.

मृत्युंजयकारांनी त्या क्षणी मनात चिरंतन असे आदराचे स्थान निर्माण केले. मृत्युंजय नावाप्रमाणेच अजरामर अशी साहित्यकृती. रसिकवाचकांचे अढळ प्रेम लाभलेली, त्यांच्या मृत्युंजय, छावा, युगंधर या साऱ्याच साहित्यकृतींना राज्य शासनाचे, साहित्य अकादमीचे आणि नामवंत मानले जाणारे अनेक पुरस्कार मिळाले..

भारतीय साहित्यजगतातील नोबेल पुरस्काराइतकाच सर्वश्रेष्ठ मानला जाणारा ज्ञानपीठ पुरस्कार भारतीय ज्ञानपीठच्या संस्थापक अध्यक्षा रमाबाई यांच्या प्रेरणेने त्यांचे पती श्री. साहू शांती प्रसाद जैन यांनी १९६१ ला द्यायला सुरुवात केली होती. त्यानंतर १९८३ सालापासून मातोश्री मूर्तिदेवी यांच्या स्मरणार्थ भारतीय संस्कृती व तत्वज्ञान यावरील भारतीय भाषेतील ग्रंथासाठी पुरस्कार द्यायला सुरुवात केली. ज्ञानपीठ इतकाच महत्वाचा असा मूर्तिदेवी पुरस्कार हा सर्वोच्च पुरस्कार १९९४ साली ‘ मृत्युंजय ‘कादंबरीसाठी शिवाजी सावंत यांना देऊन सन्मानित करण्यात आले. मराठीला मिळालेला हा एकमेव पुरस्कार आहे. मृत्युंजयकारांच्या साहित्यकृतीं अनेक भाषेत भाषांतरित ,अनुवादित झाल्या आणि गाजल्याही. या साऱ्या साहित्यकृतींना रसिक वाचकांचे अढळ प्रेम लाभले आणि आजही लाभत आहे.

शिवाजी सावंतांच्यामुळे आधी कर्ण भेटला.. समाजव्यवस्थेचा, समाज विचारधारेचा नाहक बळी ठरलेला, जन्मताच जन्मदात्या आईच्या मातृसुखाला पारखा झालेला पण अधिरथ व राधा या पालनकर्त्या आई वडिलांचे प्रेम लाभलेला, आयुष्यभर खऱ्या अर्थाने उपेक्षितच ठरलेला कर्ण..

छावा मध्ये छत्रपती संभाजी महाराज भेटले. राजकारणाचे नाहक बळी ठरलेले, जन्मापासून जन्मदात्या आईच्या मातृसुखाला पारखे झालेले पण जिजाऊ आणि धाराऊ चे निर्व्याज प्रेम लाभलेले, राजकारणामुळे आयुष्यभर विनाकारण प्रवादांनी घेरलेले उत्तुंग व्यक्तिमत्व..

युगंधर मध्ये कृष्ण भेटला. तोही जन्मदात्या आईच्या मातृसुखाला पारखा झालेला पण नंदराय आणि यशोदेचे निर्व्याज प्रेम लाभलेला.. महाभारतातील देवपदाला पोहोचलेली व्यक्तिरेखा.

या महावीर असणाऱ्या तीनही नायकांची आयुष्य समाप्ती ही ते निशस्त्र असताना झाली.. कर्णाची युद्धभूमीवर , छत्रपती संभाजी राजांची शत्रूच्या कैदेत स्वराज्यासाठी अनन्वित छळ सोसत..मनाला व्यथित करणारी, डोळ्यात अश्रू आणि त्वेष, चीड आणणारी… आणि कृष्णाची झाडाखाली निवांत बसला असताना व्याधाचा बाण पायाच्या अंगठ्यात लागून.

मृत्युंजयकारांनी अनेक पुस्तके लिहिली पण मृत्युंजय, छावा, युगंधर यातील एक जरी कादंबरी त्यांनी लिहिली असती तरी त्यांचे नाव मराठी साहित्यात अजरामरच झाले असते.

आयुष्यात आजवर अनेकदा मृत्युंजयकार भेटत राहिले..एक दोनदा प्रत्यक्ष, अनेकदा शब्दांतून.. आजही भेटतात.. कधी ‘ मृत्युंजय ‘ मधून, कधी ‘ छावा ‘मधून तर कधी ‘ श्रीकृष्ण : एक चिंतन ‘ मधून, ‘ युगंधर ‘ मधून… प्रत्येक भेट काळीज कोंदणात जपून राहिलेली. पुन्हा पुन्हा भेटावे असे वाटणारी.

जीवन अनुभवसंपन्न करणारी वाचनानुभूती देणाऱ्या, आपल्या शब्दवैभवाने चिरंजीव झालेल्या मृत्युंजयकारांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन !

© श्री आनंदहरी

इस्लामपूर, जि. सांगली

भ्रमणध्वनी:-  8275178099

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares