वैदिक साहित्यामध्ये श्री, लक्ष्मी, आणि संपत्ती यांचे स्थान अत्यंत महत्त्वाचे आणि बहुआयामी आहे. ह्या संकल्पना केवळ भौतिक समृद्धीपुरत्या मर्यादित नसून, त्या अध्यात्मिक, सामाजिक आणि नैतिक मूल्यांनाही स्पर्श करतात.
१ ) “श्री” – वैदिक संकल्पना
“श्री” हा शब्द ऋग्वेदात अनेक वेळा आलेला आहे. तो फक्त ऐहिक (भौतिक) संपत्तीचा द्योतक नाही, तर कल्याण, सौंदर्य, सामर्थ्य, प्रतिष्ठा, तेज, दैवी गुण यांचाही समावेश करतो.
“श्रीसूक्त” (ऋग्वेदावर आधारित) हे सर्वात प्रसिद्ध स्तोत्र आहे ज्यामध्ये “श्री” म्हणजेच लक्ष्मीचे स्तवन केलेले आहे.
वैदिक संकल्पनेत “श्री” म्हणजे एक दैवी शक्ती जी जीवनात संपन्नता आणि संतुलन निर्माण करते.
२) “लक्ष्मी” – संपत्तीची देवी
वैदिक काळात लक्ष्मीचा स्पष्ट उल्लेख तुलनेत थोडा उशिरा, पण “श्री” आणि “लक्ष्मी” ह्या दोघींना समान दैवी शक्ती म्हणून ओळखले जाते.
लक्ष्मी ही विष्णूची अर्धांगिनी म्हणून वैदिकोत्तर पुराणांमध्ये स्पष्टपणे दर्शवले जाते. परंतु तिची मूळ संकल्पना “श्री” ह्या वैदिक संकल्पनेतूनच विकसित झाली आहे.
लक्ष्मी ही फक्त धन, अन्न, सुवर्ण यांचीच नाही, तर धार्मिकता (धर्म), यश (जय), कीर्ती (कीर्ति), संतती (संतान) यांचीही अधिष्ठात्री देवी आहे.
३)”संपत्ती” – व्यापक अर्थ
वैदिक दृष्टिकोनातून संपत्ती ही केवळ भौतिक (मौल्यवान वस्तू, धन) न मानता, ती सात्विक गुण, विद्या, धर्म, सत्य, संयम, बल यांचा संच मानला गेला आहे.
“संपत्” म्हणजे “जे प्राप्त केले गेले आहे”, पण वैदिक दृष्टीने योग्य मार्गाने प्राप्त केलेली गोष्ट हीच खरी संपत्ती मानली गेली आहे.
“असत्य मार्गे मिळवलेली संपत्ती ही विनाशाकडे घेऊन जाते” असा वैदिक संदेश आहे (उदा. ईशावास्य उपनिषदातील – “तेन त्यक्तेन भुञ्जीथा मा गृधः कस्यस्विद्धनम्”).
४) धन व धर्म यामधील संतुलन
वैदिक ग्रंथांत धनसंपत्तीचा उपभोग घेण्याचे स्वातंत्र्य दिले गेले आहे, पण त्यात धर्म, त्याग, संयम, आणि कर्तव्य ह्या तत्त्वांचे पालन अत्यावश्यक मानले गेले आहे.
“धनं मे रुचिरं भवतु” – अशी प्रार्थना आहे, म्हणजेच धन हे योग्य मार्गाने, रुचिर (नैतिक) स्वरूपात मिळो.
५) श्री व लक्ष्मी यांचे प्रकार
श्रीसूक्तात लक्ष्मीचे विविध प्रकार सांगितले आहेत:
आद्य लक्ष्मी – मूल शक्ती
धन लक्ष्मी – आर्थिक संपन्नता
धान्य लक्ष्मी – अन्नधान्य
विद्या लक्ष्मी – ज्ञान
धैर्य लक्ष्मी – मानसिक शक्ती
संतान लक्ष्मी – कुटुंबसंपन्नता
गज लक्ष्मी – ऐश्वर्य
विजय लक्ष्मी – यश
थोडक्यात, वैदिक संकल्पनेत “श्री”, “लक्ष्मी” आणि “संपत्ती” ह्या संज्ञा फक्त भौतिक संपत्तीपुरत्या मर्यादित नाहीत. त्या संपूर्ण जीवनशैली, नैतिक मूल्ये, अध्यात्म, आणि सामाजिक उत्तरदायित्वाशी निगडित आहेत. संपत्ती ही धर्माशी जोडलेली आहे, आणि लक्ष्मी ही त्या धर्माधारित संपन्नतेची मूर्ती मानली गेली आहे.
सध्या आपण दीपावली साजरी करतो आहोत. वर्षभरातून एकदा येणारा हा प्रकाशाचा उत्सव! घराघरात आणि घराबाहेरही दीप प्रज्वलित झाले आहेत. या मंगलमय प्रकाशात घरातील आणि घराबाहेरील वातावरण उजळून निघाले आहे. दिवाळीत नवीन खरेदी, फटाके, फराळाचे विविध पदार्थ तर आपण करतोच पण यापेक्षाही थोड्या वेगळ्या दृष्टीकोनातून दिवाळीकडे पाहता येईल का? तो म्हणजे ज्ञानियांची दिवाळी. दिवाळी हा अंतरीच्या प्रकाशाचा उत्सव देखील उत्सव व्हावा. ही दिवाळी केवळ चार दिवसांची नव्हे तर वर्षभर चालणारी असेल. यातून फक्त घरे आणि घराबाहेरील वातावरणच नव्हे तर मने देखील उजळून निघतील. अशी ही ज्ञानियांची दिवाळी.
याचा अर्थ असा की, अज्ञानाच्या अंधाराला विवेकबुद्धीच्या प्रकाशाने दूर करणे हीच खरी दिवाळी. आपल्या उपनिषदांचा आपल्याला संदेश आहे तो म्हणजे ‘ तमसो मा ज्योतिर्गमय ‘. अंधारातून प्रकाशाकडे जाण्याचा संदेश देणारा हा मंत्र आहे. हा मंत्र म्हणजे आपल्या संस्कृतीचे वैशिष्ट्य! हा मंत्र केवळ धार्मिक आहे असे समजण्याचे कारण नाही. तो आपल्याला ज्ञानयात्रेची दिशा दाखवतो.
दिवाळी आली की आपल्या घराघरांत दिव्यांची रोषणाई होते, फराळाचा गंध वातावरणात भरून राहिलेला असतो आणि फटाक्यांच्या झगमगाटात वातावरण उजळून निघते. आनंदाच्या, गडबडीच्या आणि आवाजाच्या या सगळ्या बाह्य प्रकाशात सगळे मग्न असताना काहीजण मात्र शांतपणे, विचारांच्या गाभाऱ्यात बसून, एका वेगळ्या दिवाळीचा उत्सव साजरा करतात आणि तो असतो— ज्ञानियांची दिवाळी.
आपण सामान्य माणसे अंधार दूर करण्यासाठी तेलाची पणती लावतो. ज्ञानियांच्या हृदयात मात्र तेवत असतो ‘ ज्ञानाचा दीप ‘. हा ज्ञानदीप अज्ञानाचा अंधकार नाहीसा करून विवेक बुद्धीच्या प्रकाशाने आपले अंतरंग उजळतो. दिवाळीचे दिवस त्यांच्यासाठी नेहमीपेक्षा जरा वेगळे असतात. त्यांच्यासाठी ‘धनत्रयोदशी’ म्हणजे सोने-चांदी नव्हे, तर उत्तम विचार देणाऱ्या नवीन ग्रंथांची खरेदी. तेच त्यांच्या दृष्टीने मौल्यवान धन असते. ते करतात नव्या विचारांचे संकलन आणि आत्मशुद्धीची तयारी.
ज्याच्या घरात ग्रंथांचा सुवास आहे, त्याला बाहेरील रोषणाईची गरज नसते. त्याचे अंतरंग नेहमी प्रकाशमान असते. त्याच्यासाठी प्रत्येक चांगला विचार हा मौल्यवान हिरा असतो, जो मनाच्या तिजोरीत जपून ठेवला जातो. अशा विचारांनी त्याची तिजोरी भरत जाते. बाहेर फुटणाऱ्या फटाक्यांच्या आवाजापेक्षा तो अंतरातील आवाज ऐकत असतो. सकारात्मक विचारांची बीजे रुजवून अंधश्रद्धा, कुविचार, त्याज्य रूढी आणि परंपरा यांच्यावर तो आघात करत असतो. ज्ञानियांची दिवाळी गोंगाटात नव्हे, तर संवादात साजरी होते. दिवाळीला मित्र एकत्र येतात. फराळही करतात पण त्याचबरोबर ते करतात नवीन विचारांचा स्वीकार, एखाद्या पुस्तकावर चर्चा, ते शोधतात जीवनाची दिशा दाखवणाऱ्या एखाद्या कवितेचा अर्थ. समाजातील प्रश्न त्यांना भेडसावत असतात, त्यावरही ते चर्चा करतात. चर्चा करून ते थांबत नाहीत. ते एखाद्या वृद्धाश्रमात जातात. तेथील वृद्धांसाठी होतात मदतीचा हात, अनाथालयातील मुलांसाठी घेऊन जातात गोडधोड फराळाचे जिन्नस, कुठेतरी आदिवासी पाड्यावर भगिनींना नवीन साड्या, कपड्यांचे वाटप करतात. पावसाने सर्वस्व हिरावून घेतलेल्या शेतकऱ्याच्या उदास चेहऱ्यावर त्यांचे धीराचे शब्द जादू करतात. जमेल तेवढी मदत करून आम्ही तुमच्यासोबत आहोत असा धीर देतात. त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून अशा ज्ञानियांची दिवाळी शतपटीने उजळून निघते.
ज्ञानियांसाठी नरक चतुर्दशी म्हणजे अंतरात दडून बसलेल्या राक्षसांचा वध. कोणते असतात हे राक्षस? तर ते असतात अहंकाराचे, असहिष्णूतेचे, वाईट विचारांचे, अज्ञानरूपी अंध:काराचे! ज्ञानी लोक या सगळ्या गोष्टींचा नाश करण्याचा प्रयत्न करून अनोखी नरक चतुर्दशी साजरी करतात. ते अभ्यंग स्नान करतात ते आत्मपरीक्षणाच्या पाण्यात आणि वापरतात सुगंधी उटणे वापरतात सद्विचारांचे. अशा लोकांच्या विचारांचा सुगंध आसमंतात पसरला की तो वातावरण शुद्ध करतो. त्यांची दिवाळी ही जगण्याचा उत्सव होते.
ज्ञानियांना माहित असते की लक्ष्मीपूजन म्हणजे केवळ धनसंपत्ती नव्हे, तर बुद्धीची आणि सद्विचारांची समृद्धी. तीच असते खरी लक्ष्मी. ते जाणतात की सोनेनाणे, पैसा यासारखी क्षणभंगुर संपत्ती चोरली जाऊ शकते, पण ज्ञानाचा प्रकाश कधी विझत नाही. ही संपत्ती जेवढी वाटली तेवढी वाढत असते. म्हणून ते जमेल तेवढे या संपत्तीचे वाटप करत असतात.
आजचे युग तंत्रज्ञानाचे. आपण वावरतो डिजिटल युगात. हातात असतो मोबाईल आणि मनात मात्र असतो गोंधळ. बाहेरील स्क्रीन उजळतात, पण आतील अंधार मात्र वाढत जातो. अशा वेळी ज्ञानियांची दिवाळीच आपल्याला दिशा देते. तमसो मा ज्योतिर्गमय! त्यांचे विचार, त्यांचे वागणे आपल्याला अंधाराकडून प्रकाशाकडे वाटचाल करण्यासाठी मदत करते. संपूर्ण मानवजातीलाच अशी माणसे दिशा दाखवतात.
आजच्या या डिजिटल युगातही काही तरुण असे आहेत की जे स्क्रीनमध्ये अडकून पडत नाहीत. त्यांची पावले वळतात वाचनालयाकडे. अशा ठिकाणी ते दिवाळीचा ‘ज्ञानोत्सव’ साजरा करतात. पुस्तक वाटप, ग्रंथप्रदर्शन, संवाद सत्रं यांचं आयोजन करतात. काही ध्येयवादी शिक्षक विद्यार्थ्यांना विविध पुस्तके वाचण्यासाठी प्रवृत्त करतात. त्यांच्या जीवनात सदविचारांचा प्रकाश आणतात आणि त्यांचे जीवन उजळवतात.
हीच असते ज्ञानियांची दिवाळी. खरी ‘ज्ञानदीपावली’. कारण जेव्हा एक मन सद्विचारांनी उजळते, तेव्हा समाजात हजारो दिवे प्रकाशमान होतात. अंतरीच्या प्रकाशाची ज्योत पेटते. अंतरीचा प्रकाश असतो शाश्वत. म्हणूनच, यंदा घरातील पणत्यांबरोबर मनातले दिवेही पेटवा. घर सजवा पण मनही प्रकाशाने उजळू द्या. उपनिषदांनी सांगितलेल्या मार्गावर वाटचाल करू या. ‘ तमसो मा ज्योतिर्गमय!’
(पूर्वसूत्र- त्या दिवशी ऑफिसमधून बाहेर पडल्यानंतरही माझ्या मनात तक्रारदार सहस्त्रबुध्दे ठाण मांडून बसले होते. तोपर्यंत कधीच न पाहिलेल्या त्या माणसाने त्याच्याही नकळत माझ्या मनात एक प्रकारची बेचैनी निर्माण करून ठेवली होती. रात्री अंथरुणाला पाठ टेकली तरी स्वस्थता नव्हतीच.)
त्या अस्वस्थतेत मनात रूतून बसलेला एकच विचार मला बोचत राहिला होता. उद्या नेमकं काय होईल? ते माझ्याशी मोकळेपणाने बोलतील कीं प्रभूदेसाईंसारखंच मलाही घरात न घेता बाहेरच्या बाहेर हाकलून लावतील?
हीच अस्वस्थता मनात घेऊन दुसऱ्या दिवशी सकाळी मी त्यांच्या फ्लॅटची डोअरबेल वाजवली. एकदा. दोनदा. कांही क्षण बोचऱ्या शांततेत गेले आणि यथावकाश दार उघडलं गेलं.
” काय हवंय..? “
अर्धवट उघडलेल्या दारात एक मुलगी उभी होती. उदास चेहरा. गोंधळलेली प्रश्नार्थक नजर.
“सहस्त्रबुद्धे आजोबा आहेत ना? मला भेटायचं होतं. “
“आपण..? “
“मी.. लिमये. अरविंद लिमये. एक महत्त्वाचं काम होतं. “
” बाबा आहेत,.. पण नुकतीच पूजा आवरून ‘गुरुचरित्र’ वाचायला बसलेत.
आजचा अध्याय मोठा आहे,.. थोडा वेळ लागेल. आणि नंतर त्यांना लगेच बाहेर जायचंय. “
मला काय बोलावं सुचेना.
” मी फार वेळ घेणार नाहीय. निदान त्यांची ओळख तरी होईल. ते म्हणाले तर मग मी उद्या येईन. त्यांचं आवरेपर्यंत थांबू कां मी? “
ती क्षणभर विचारात पडली. मग “या. ” म्हणून आत वळली. भिंतीजवळच्या खुर्च्यांकडे निर्देश करीत ‘बसा’ म्हणाली. आत जाऊन लगबगीनं पाण्याचं तांब्याभांडं आणून ठेवलंन् न् आत निघून गेली.
सहस्त्रबुद्धे पूजा आवरून ‘गुरुचरित्र’ वाचायला बसलेत हे त्यांच्या मुलीकडून ऐकल्यानंतर काल मनात येऊन गेलेलेच विचार मला आठवले…
‘उद्या काय होणार आहे मला माहित नाही. त्यांना स्वतः जाऊन भेटणं एवढंच माझ्या हातात आहे. यश येणार की अपयश हे आता सहस्त्रबुद्धेंच्या नव्हे तर फक्त ‘त्या’च्याच हातात आहे…. ‘ माझ्या अस्वस्थ मनाला तेव्हा स्पर्शून गेलेल्या ‘त्या’च्या विचाराचा धागा माझ्या मनात नकळत सहस्त्रबुद्धे आजोबांच्या ‘गुरूचरित्र’ वाचनाशी जोडला गेला आणि मनावरचं जड झालेलं ओझं कुणीतरी अलगद उतरवून घ्यावं तसं मला एकदम हलकं वाटलं. समोरच्या तांब्यातलं घोटभर पाणी पिता पिताच नजर नकळत सभोवतालचा अंदाज घेत राहिली. रंग उडालेल्या
भिंतीवरचं जुनंपुराणं घड्याळ, एक लोखंडी कॉट, जुनं लोखंडी कपाट आणि भिंतीलगतच्या फोल्डिंगच्या लाकडी खुर्च्या..! नजरेनं क्षणार्धात टिपलेल्या या साधेपणात एक प्रकारचं औदासिन्यही भरून राहिलेलं होतं!
” हं.. बोला… ”
मी भानावर आलो. दचकून वर पाहिलं आणि एखाद्या प्रतिक्षिप्त क्रियेसारखा उठून उभा राहिलो.
” सर, नमस्कार.. “
“नमस्कार,.. बसा” ते हसतमुखाने म्हणाले. सहस्त्रबुद्धे आजोबाच ना हे किं…? मलाच प्रश्न पडला. या माणसाचं हसतमुख, सौम्य रूप प्रभुदेसाईनी वर्णन केलेल्या संतापी, तर्कटी, हेकेखोर अशा विक्षिप्त वृध्द माणसाच्या प्रतिमेला परस्पर छेद देणारंच होतं.
” एस्. एस्. सहस्त्रबुद्धे आपणच ना..? ” स्वतःचीच खात्री करून घ्यावी तशा सहजस्वरांत मी विचारलं.
“हो.. आपण? “
” मी… मी ए. जी. लिमये. चीफ मॅनेजर म्हणून युनियन बॅंकेच्या इथल्या झोनल आॅफिसमधे मी नुकताच चार्ज घेतलाय आणि… “
बॅंकेचं नाव ऐकताच त्यांच्या चेहऱ्यावरचं स्मितहास्य क्षणार्धात विरून गेलं. चेहरा आक्रसला.
” काम काय आहे ते बोला… ” त्यांनी फर्मावलं.
” तुम्ही एका ब्रॅंचमॅनेजर विरूध्द केलेल्या तक्रारीबाबतची फाईल माझ्या वाचनात आली आणि म्हणून… “
” म्हणून वाट वाकडी करून आज इथं आलात? ” ते कडाडले. ” दूधखुळा समजलात कां मला..? आजपर्यंत दर आठवड्याला एकेक पोस्टकार्ड खरडून दरवर्षी ५२ या हिशोबाने गेल्या ३ वर्षात १५६ स्मरणपत्रं पाठवल्यानंतर आज जागी झाली कां तुमची बॅंक..? “
“नाही तसं नाही.. पण.. “
“पण-परंतुच्या गप्पा मला सांगू नका. तुमच्या बँकेचं नाव सहज जरी कानावर पडलं तरी तुमच्या त्या निर्लज्ज ब्रॅंचमॅनेजरचा चेहरा माझ्या डोळ्यासमोर उभा रहातो आणि माझ्या तळपायाची आग मस्तकांत जाते. या तुम्ही. ती फाईल व्यवस्थित वाचलीयत ना तुम्ही? मग त्या बेजबाबदार माणसाविरूध्द आधी कारवाई करा. यामधे ब्रह्मदेव उतरून आला तरी तडजोड होणे शक्य नाहीss. या तुम्ही. ” ते ताडकन् उठले…
सगळं हातून निसटून जाण्यापूर्वी ते घट्ट धरून ठेवणं आवश्यक होतं पण….
” सर.. मला जे सांगायचंय ते निदान ऐकून तरी घ्या ना प्लीज… “
” मला फाफटपसारा नकोsय. बोलाs.. काय सांगायचंय..?
“तुम्ही म्हणालात तशी ती फाईल वाचलीय मी. तुम्ही लिहिलेली स्मरणपत्रंही पाहिलीत. त्यासंबंधीच तुमच्याशी मोकळेपणानं बोलायचं होतं सर. म्हणून… “
” मी बोललोय सर त्यांच्याशी ” मी शांतपणे म्हणालो. “पण कोणत्याही प्रश्नाला दोन बाजू असतात ना सर? तुमची बाजू न ऐकताच, ती समजून न घेताच, कोणत्याही निष्कर्षाप्रत येणं मला योग्य वाटलं नाही म्हणून मी आलोय. यात माझा कोणताही स्वार्थ नाहीय. माझ्यावरची जबाबदारी स्वत:शी प्रामाणिक राहून मला पूर्ण करायचीय. हे करताना तुमच्यावर नकळत अन्याय होऊ नये असं मला मनापासून वाटतंय. म्हणून फक्त तुमची बाजू जाणून घ्यायला मी आलोय. मला सहकार्य करायचं कीं नाही हे तुम्ही ठरवायचंय.
तेही एक उपचार म्हणून आजच्याआज ठरवावं असा माझा आग्रह नाहीय. तुम्ही शांतपणे विचार करा, मग सांगा.
तुमचा गुरूचरित्र सप्ताह सुरू आहे ना? त्याची आधी सांगता होऊ दे. त्यात व्यत्यय नको. हवंतर त्यानंतरच्या तुम्ही सांगाल त्या दिवशी मी पुन्हा येईन. “
ते विचारात पडल्याचे पाहून मी घुटमळलो.
“सप्ताह असं नाही. माझं रोज एक अध्याय असं नित्यवाचनच असतं. आज मला बाहेर जायचंय एका कामासाठी. तुम्हाला शक्य असेल तर असंच उद्या सकाळी आलात तरी चालेल… ” ते शांतपणे म्हणाले.
” पण त्या माणसावर कारवाई होण्याच्या बाबतीत कोणतीही तडजोड होणार नाहीs.. हे लक्षात ठेवा. “
“मी समजू शकतो सर. येतो मी. “
त्यांचा निरोप घेऊन मी बाहेर पडलो. यातून पुढे काय निष्पन्न होणाराय मला माहित नव्हतं. पण आज माझ्यासाठी निदान सहस्त्रबुद्धे आजोबांच्या मनाची दारं थोडीतरी किलकिली झाली होती आणि त्या दाराआड ‘तो’ साक्षीरूपाने उभा असणार आहे हा एक शुभसंकेतच होता माझ्यासाठी. म्हणूनच तिथून बाहेर पडताना फार कांही न मिळताही बरंच काही गवसल्याचं समाधान मनात भरून राहिलं होतं..!!
ज्ञानेश्वरी वाचताना लक्षात येतं की, संतांचा दिवाळीकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे. त्यांची दिवाळी पाच-सहा दिवसापूर्वी मर्यादित नाही. जीवनात कायमची दिवाळी कशी राहील ते संताने पाहिलं व तसं मार्गदर्शन आपल्या ग्रंथातून केलं. संतांची दिवाळी ही ज्ञानप्रकाश देणारी, दुष्ट प्रवृत्तीचा नाश करून सुष्ट प्रवृत्ती जागृत करणारी आहे. म्हणून ज्ञानेश्वर म्हणतात,
मी अविवेकाची काजळी l फेडूनि विवेक दीप उजळी l
तरी योगिया पाहे दिवाळी l निरंतर ll ज्ञा.४/५४
यातून ते आपल्या अवताराचा हेतूच स्पष्ट करतात. भगवंतांनी तीन सांगितले हा चौथा. माणसाच्या जीवनात अविवेक हेच दुःखाचे मूळ आहे. काजळी दीपाच्या प्रकाशाला झाकून टाकते. तसाच अविवेक माणसाच्या सद्बुध्दीला झाकून टाकतो. तोच दूर झाला तर सद्विचाराची वाट दिसेल. अविवेक म्हणजे कामक्रोधादि षड्रिपु. ते दूर झाले की आत्मानात्म विवेकाचा दीप प्रकाशेल.अनात्म, त्याज्य गोष्टीचा त्याग आणि मग राहील ते एकमेव ब्रह्म. ते मी आहे हा विवेक आणि त्या ब्रह्मासारखे सच्चिदानंद आपले रूप ही खात्री म्हणजे अखंड आनंद. अशी अवस्था योग्यांना प्राप्त होते तशी सर्वांनाच होऊदे अशी ज्ञानेश्वरांची इच्छा.
जैशी पूर्वदिशेच्या राउळी l उदयाची सूर्ये दिवाळी l
की येरा हि दिशा तियेचि काळी l काळीमा नाही ll ज्ञा.५/८६
ज्याप्रमाणे पूर्व दिशेच्या राजवाड्यात सूर्योदय रुपी दिवाळी आली असता दुसऱ्या दिशेतील अंध:कार ही दूर होतो . तशीच
तैसी वाचा श्रोतया ज्ञानाची l दिवाळी करी ll ज्ञा.१५/१२
तसेच ज्ञानेश्वरानी आपल्या रसाळ व आल्हाददायक वाणीने सांगितलेले ज्ञान सगळ्या श्रोत्यांना ज्ञानी करून टाकते. ‘ज्ञानेश्वरांच्या वाणीतून जो ज्ञानाचा प्रकाश पडेल तो इतका व्यापक असेल की जो कोणी ते शब्द ऐकेल तो ज्ञानप्रकाशाने न्हावून निघेल. त्यांना ज्ञानाची दिवाळी अनुभवायला येईल.’ अज्ञान गेले त्रैलोक्य ऐक्याने प्रकाशित होते. हीच जीवब्रह्म ऐक्याची स्थिती व ब्रह्मानंद आणि महासुखाची दिवाळी हाच मोक्ष.
तैसे होय तिये मेळी l मग सामरस्याच्या राउळी l
महासुखाची दिवाळी l जगेसि दिसे ll ज्ञा.६/८९
अशाप्रकारे ज्ञानेश्वरांना ज्ञानाची दिवाळी म्हणजे निरंतर महासुख देते ती अभिप्रेत आहे. ज्ञान, विवेक आणि सामरस्य अवस्था अशा तत्वातून ती साजरी केली आहे. म्हणून ती महासुखाची ठरली.
ज्ञानाचा दिवा अंतर्बाह्य उजळून टाकतो. सर्वच संताना अशी दिवाळी अपेक्षित होती म्हणून संत तुकाराम म्हणतात,
साधु संत येती घरा l तोचि दिवाळी दसरा l
संत निवृत्तीनाथ म्हणतात, नित्यता दिवाळी l नाही तेथे द्वैत l
संत नामदेव म्हणतात, विठोबाचे राज्य l आम्हा नित्य दिवाळी l
संत सेना महाराज म्हणतात,
देखता संतचरण lआजी दिवाळी दसरा l
संत सखु म्हणते,
आनंदाची दिपवाळी l घरी बोलवा वनमाळी l
घालीते मी रांगोळी l गोविंद गोविंद l
अशा प्रकारे सर्व संतानी देवाच्या सान्निध्यात आनंदाची दिवाळी भोगली.
आमच्या घरी शब्दरूपी रत्नांचे धन आहे आणि शब्दरूपी शस्त्र आम्ही जतन केले आहे. शब्दच कसे रत्न आणि शस्त्र असे विरुद्ध होतात, असा प्रश्न सर्वसामान्यांना पडतो.
लौकिक दृष्टीने घरदार, पैसा- अडका, सोनं -नाणं, जमीन- जुमला हे धन ठरतं. त्याचा उपयोग भोगासाठी, चरितार्थासाठी, दानधर्मासाठी केला जातो. तुकाराम अशाच एका सुखवस्तु घरात जन्मले. पण कुटुंबातील लोकांचे मृत्यू, धंद्यातील उतरण आणि दुष्काळ यामुळे हालाखिची परिस्थिती निर्माण झाली. तुकारामांचे प्रपंचातील लक्ष कमी झाले. ते ईश्वर चिंतनात राहू लागले. निर्धन तुकारामांच्या मुखातून शब्दरूपी धन ओसंडून वाहू लागले. जे लौकिक संपत्तीने साधलं नसतं ते त्यांच्या अभंगवाणीने साध्य झाले.
त्या शब्दांनाच रत्नाचे तेज आणि शस्त्राची धार प्राप्त झाली. परमेश्वर भेटला तरी जनसमुदायाचा विसर त्यांना पडला नाही. धर्माचे पालन आणि पाषाण खंडन यासाठी आपला अवतार असल्याचे त्यांनी ओळखले. आपले शब्दरूपी धन त्यांनी मुक्तपणे उधळले आणि क्रांती केली. सदाचारी आणि दांभिक प्रवृत्तीच्या लोकांचे समाजात मिश्रण असते. तुकारामांना सर्वांचाच कळवळा. ‘ बुडते हे जन न देखवे डोळा’ असा त्यांचा स्वभाव होता. सज्जनांसाठी त्यांचे शब्द मेणाहून मऊ तर दुर्जनांसाठी वज्राहून कठोर झाले.
बेभान, पाखंडी, ढोंगी समाजाला वठणीवर आणण्यासाठी, ‘तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाणं फिरे l’ अशा थाटात ते सुधारणा कार्याला तत्पर झाले. ‘ नाठाळाचे हाती देऊ काठी ‘असे त्यांचे शब्द शस्त्रासारखे ठरले. लोकांना आपली चूक कळली. लोकांची मने त्यांनी जिंकली. लोकांना नामस्मरणाचा सुलभ, सोपा मार्ग दाखवला. ‘ पुण्य पर उपकारl पाप ते परपीडा l’ अशी पाप- पुण्याची सोपी व्याख्या लोकांसमोर ठेवली. स्वतः संसारातून दूर झाले पण लोकांचा संसार उन्नत व्हावा म्हणून शब्दातून त्यांनी मार्ग दाखवला. विपन्नावस्थेतही परमार्थ करता येतो हे दाखवून दिलं.
आजच्या धकाधकीच्या व अशांततेच्या काळातही माणसाला सावरणारी व समाधान देणारी ही तुकोबांची वाणी. रत्नाला नाश नाही तसेच त्यांचे अभंग अभंग राहिले. पुढेही राहतील. रत्न चमकदार असते आपल्या तेजाने परिसर उजळून टाकते. असेच शब्द समाजाच्या उन्नतीला कारण होतात, तेव्हा रत्न होतात व समाजातील अपप्रवृत्ती विरोधात लढण्याची प्रेरणा देतात तेव्हा शस्त्र होतात. हेच लोकमान्य टिळकांनी स्वातंत्र्य लढ्यात आपल्या जहाल लेखणी द्वारे साधले. असे हे शब्दाचे सामर्थ्य.
रसना, जिह्वा जीभ, एक महत्वाचे ज्ञानेंद्रिय. ज्या इंद्रियाने पदार्थाची रुची कळते ती रसना. जे इंद्रिय विविध रसांचा आस्वाद घेते ती रसना. काही भावना, संवेदनांचा प्रत्यक्ष जिभेशी संपर्क झाला नाही तरी त्यात एखादा रस असतो आणि तो आपण ‘चाखतो’, मग ते अक्षरवाङ्मय असो, संगित असो, गंध असो, शिल्प आणि चित्र असो. थोडक्यात या ‘रस’ग्रहण’ करणाऱ्या रसनेलाच जिव्हा किंवा जीभ म्हणतात.
आपण एखाद्या कलाकृतीचा ‘रस’स्वाद’ घेतो, ज्ञानेश्वरी ‘रसाळ’ आहे, लता दिदींची सगळीच गाणी ‘मधाळ’, ‘रसाळ’ आहेत, मला त्याच्याशी बोलण्यात अजिबात ‘रस’ नाही, निजामपुरकर, कोपरकर, कळवणकर बुवांची कीर्तने ‘रसाळ’ असायची, बालगंधर्वांच्या नाटकांवर ‘रसिकां’च्या उड्या पडायच्या, श्यामची आई या साने गुरुजींच्या आत्मकथनात ‘वात्सल्यरस’ अगदी दुथडी भरून वहातो, कांदा भज्यांचा वास आला आणि माझी जीभ ‘चाळवली’, ‘खवळली’, ‘तोंडाला पाणी सुटले’ इ इ. या सगळ्या वाक्यात कोणता ना कोणता ‘रस’ आहे आणि रसाचा संबंध रसनेशी असतो हे आपल्याला चांगले ठाऊक आहे!
जीभ हा पृष्ठवंशीय प्राण्यांच्या शरीराच्या तोंडामधला लालसर गुलाबी रंगाचा एक अवयव आहे. हा अवयव पूर्णपणे स्नायूंचा बनलेला असतो. माणसाच्या सुमारे दहा सेंटीमीटर लांब आसलेल्या या मांसल अवयवावर सुमारे १०, ००० रुचिकलिका असतात. त्यामुळे आपणास पदार्थाची चव कळते. जिभेच्या विशिष्ट भागावर असणाऱ्या रुचिकालिका वेगेवेगळ्या चवीची जाणीव करून देतात अशी वैज्ञानिकांची समजूत होती. त्यानुसार जिभेच्या टोकाकडे गोड, मागील बाजूस कडवट, दोन्ही बाजूस आंबट व खारट चव समजते असे वाटत होते. परंतु आता संशोधनाने सर्व चवींची जाणीव जिभेच्या पृष्ठभागावर सगळीकडेच होते असे सिद्ध झाले आहे. जीभ या अवयवाचे वजन सामान्यतः ५५-५६ ग्रँम असते.
बहुतेक सर्व पृष्ठवंशीय प्राण्यांमध्ये जीभ अन्न गिळण्यासाठी, चवीच्या जाणीवेसाठी सहाय्य करते. जीभ, दात, ओठ, कंठ, टाळू व घसा यांच्या साहाय्याने मनुष्य मुखाने निरनिराळे ध्वनी काढू शकतो.
सर्व स्वर आणि व्यंजनांचे उगमस्थान म्हणजे माणसाचे मुख. मुखातून ध्वनीरुपाने प्रकट होणारी ती ‘वाणी’. परा, पष्यंती, मध्यमा आणि वैखरी हे वाणीचे चार प्रकार. आपण ज्या वाणीने बोलतो ती ‘वैखरी’ वाणी. कुणाच्या वैखरी वाणीतून आशीर्वचने बाहेर पडतात तर कुणाच्या तळतळाट, शिव्याशाप. ‘जी दुसऱ्यास दुःख करी, ती अपवित्र वैखरी’ असे समर्थ दासबोधात सांगतात. वैखरीचा उपयोग कसा करायचा हे उपयोग करणाऱ्या व्यक्तीच्या स्वभावावर, त्याच्यावर झालेल्या संस्कारांवर अवलंबून असते.
निसर्गाने सर्व प्राणिमात्रात पूर्ण विकसित कंठ केवळ मानवालाच प्रदान केला आहे. त्याच्या बळावर, आपल्या प्रतिभेची जोड देऊन माणसाने अगणित भाषा आणि संगीत विकसित केले.
रोगनिदान करण्यासाठी जिभेचा रंग, स्वरूप आणि ओलसरपणा या गोष्टी लक्षात घेतल्या जातात.
जीभ या अवयवावरून मराठीत किती तरी म्हणी आणि वाक्प्रचार प्रचलित आहेत. उदा. ‘उचलली जीभ लावली टाळ्याला’, ‘तुझ्या जीभेला काही हाड आहे की नाही?’, ‘लांब जीभ करून बोलू नकोस’, ‘हे म्हणायला माझी जीभ रेटली गेली नाही’. ‘जिभेला लगाम घाल’, ‘जीभ हासडून टाकीन’, ‘जिभेवर साखर आणि डोक्यावर बर्फ ठेवावा’, ‘जिभेचे फार चोचले नकोत’, ‘जगामध्ये जगमित्र, जिह्वेपाशी आहे सूत्र’ (दासबोध) जेव्हा ‘जीभ घसरते’ तेव्हा अनर्थ होतो. (जीभ घसरल्यामुळेच तपस्वी कुंभकर्णाला इंद्रासनाऐवजी मरेपर्यंत निद्रासनावर पडावे लागले!) जीभ सैल सुटणे, इ. इ. इ. वाचकांना या यादीत खूप भर घालता येईल.
जिह्वाग्री भगवती सरस्वतीचा वास असतो. बुद्धीची देवता श्री गणेश असली तरी वाणीची देवता सरस्वती आहे. साक्षात श्रीमद्शंकराचार्यांनीही या जिह्वेची स्तुती केली आहे. त्यांचे एक अपरिचित ‘जिह्वास्तुतिस्तोत्र’ उपलब्ध आहे. ते असे….
(श्री.गोस्वामी संपादित ‘शंकराचार्यांची स्तोत्रे’ या ग्रंथाच्या दुसऱ्या खंडात ते वाचकांना पहायला मिळेल. )
*
हठयोग आणि राजयोगात ‘खेचरी’ ही एक महत्वाची मुद्रा’ आहे. या मुद्रेत जिभेचे कार्य अनन्यसाधारण आहे. यात साधक आपली जीभ टाळूला समांतर उलटी वळवून टाळूकडून घशात उघडणाऱ्या ब्रह्मरंध्रातून झिरपणाऱ्या अमृत बिंदूंचे प्राशन करतो. ही मुद्रा सिद्ध झाल्यावर साधक क्षुधा, तृष्णा, विष, रोग, मूर्च्छा, वार्धक्य, अकाल मृत्यू इत्यादींपासून मुक्त होतो, असे ‘हठयोगप्रदीपिका’ म्हणते. (३. ३७-३८).
रसनेला चिरयौवन प्राप्त झालेले आहे. माणूस कितीही वृध्द होवो, त्याच्या देहावर हव्या तेवढ्या सुरकुत्या पडोत, डोळ्यांना अंधत्व येवो, शरीराची शक्ती आणि ऊर्जा क्षीण होवो, पण जिव्हा कधीच थकत नाही, वृद्ध होत नाही. तिचा ‘वळवळ’ आयुष्याच्या अंतिम क्षणापर्यंत तशीच चालू राहते. इतर अवयवांच्या तुलनेत जीभेचे रूप बरेच लहान आहे, पण या लहानशा इंद्रीयावर विजय मिळवणे कठीणातले कठीण काम आहे!
मुखरूपी म्यानात राहणारी जीभ हे दुधारी खड्ग आहे. ही जीभ ताब्यात राहावी म्हणून निसर्गाने दातरूपी बत्तीस सशस्त्र सैनिकांचे कडे तिच्याभोवती उभारले आहे, पण जीभ अशी चंचल, नाठाळ आहे की, कालांतराने ती त्या दातांना देखील उखडून टाकते. आपल्या बोलण्याने दुसऱ्याकडून स्वतःच्या तोंडातले हे दात तोडूनही घेऊ शकते!
जीभ कुणाला घायाळ करते, तर कुणाच्या मनावरचे दुखरे व्रण बुजवू शकते. तिच्यातून अमृत झरते तसेच हलाहल देखील पाझरते. जीभरूपी भूमी अशी विचित्र आहे की, तिथे फुले उमलतात, तसेच काटेही उगवतात.
वार्धक्यात अतिश्रमाने देहाचा प्रत्येक अवयव थकतो, ज्ञानतंतू थकतात, मेंदू थकतो पण जिभेला असे यौवनाचे वरदान प्राप्त झालेले आहे की, तिला थकवा असा कधीच जाणवत नाही. अनेक ‘शक्ती आणि सिद्धी’ प्राप्त झालेल्या ह्या इवल्याशा पण शक्तिशाली जिभेवर ताबा मिळविणे हे अत्यंत दुष्कर कर्म आहे. जे लोक जिभेवर ताबा (खाणे आणि बोलणे या दोन्हीवर) मिळवू शकतात ते खरंच धन्य धन्य होत!
जीवन म्हणजे अनोळखी जागी अंधारात मारलेली उडी,ती कुठे कशी पडेल याचा अचूक अंदाज बांधणे सहज शक्य नाही. पण म्हणून ते त्यागताही येत नाही. त्याचे ओझे परमेश्वराने प्रत्येक जीवावर जबरदस्तीने लादलेले आहे. ते त्यागायचा नुसता प्रयत्न केला तरी माणसाच्या कपाळी डरपोक असल्याचा शिक्का समाजाकडूनच मारला जातो. म्हणूनच ते ओझे पेलतच जगावे लागते. त्या शिवाय माणसाजवळ कुठलाच पर्याय नसतो. संथ,शांत, धाडशी, चंचल, गंभीर, सोज्वळ, संयमी, सात्विक, बदफैली, निरागस ,अशा अनेक प्रकारे ते जगता येते. पण त्यासाठी सुध्दा बळकट मनोधैर्य, मनोनिर्धार असावाच लागतो. तो नसेल तर त्या जगण्याला अर्थच उरत नाही.
जगणारे ते स्वीकारतात, जगण्याचा पर्याय निवडतात आणि जगू लागतात. आपल्या जगण्याचा आराखडा तयार करतात. तो प्रयत्न पूर्वक राबवत असतात तिथेही जगणाराला अंदाजच बांधावा लागतो .तो कितपत यशस्वी होईल हे निश्चित सांगता येत नाही.सगळ जगणच असं विचित्र आवर्तनाने भरलेल आहे. हे माहीत असूनही जगणारा ते जगतच जातो. शेवटी जगणं म्हणजे गुडघाभर चिखलात चालायच, चिखलात भरभर, जोरात चालतात येत नाही, आणि दमल्यावर खाली बसताही येत नाही. कारण जगणं माणसांची दमछा करण्या साठीच दिलं गेलं आहे . माणसाला माणसाची ओळख पटावी म्हणूनच हे नियोजन असावं. प्रत्येकाच्या जगण्यात स्वर्थीमाणसं यायलाच हवीत त्याच्याशिवाय माणसाला निस्वार्थी माणसांची किंमतच कळणार नाही. देवही मोठाच डोकेबाज आहे .त्यानं माणसाला सहजपणे या जगण्याच्या चक्रव्यूहात अडकवून टाकलं आहे आणि तो बसलाय त्यांची गंमत बघत.
☆ प्रवासातील सहप्रवासी… ☆ सौ.वनिता संभाजी जांगळे ☆
माझे पती केंद्रीय पोलीस सेवेत असल्यामुळे त्यांच्यासोबत पुर्ण देशभर प्रवासाचा योग येत असतो. हा प्रवास कधी ट्रेनचा, कधी बसचा तरकधी ट्रॅव्हल्सचा सुरू असतो. आता अगदी अलिकडे तर कर्नाटकमधून कारवार-पिंपरी बस तर माझ्या प्रवासाची चांगलीच सोबत झाली आहे. असो. खरे सांगायचे तर या प्रवासातील सहप्रवासी ते मात्र कधी कधी खूपच गमतीदार असतात. अगदी दिर्घकाळ लक्षात राहणारे म्हणा. हा प्रवास पण फार गमतीशीर असतो बघा. प्रवासात देखील आपल्या बर्याच ओळखी होतात. अगदी गावगल्ली पासून ते पै-पाहूण्यांचा माग काढला जातो. इतके आपण आपल्या सोबतच्या शीटवर बसलेल्या अनोळखी व्यक्तीसोबत गप्पांत रंगून जातो.
आता ट्रेनच्या प्रवासाच्या बाबतीत बोलायचे म्हटले तर ट्रेनमध्ये आरक्षण न झालेल्या प्रवाशांची लुडबुड फारच असते पहा. अगदी लग्नात मिरवणाऱ्या बिनकामाच्या करवल्या आणि करवले असतात ना नेमकी तशीच पहा! उगी आपले इथून उठ तिथे बस पुन्हा तिथून उठायचे दुसर्या शिटवर बस. शीट रिकामी दिसली की आपलं टेकायचं लगेच. असे संपूर्ण प्रवासभर आपल्या सोबतच्या बॅगचे हाल करत त्याचा प्रवास चालू असतो. शेवटी पक्के आरक्षण असणाऱ्या प्रवाशास विनंती करून ते आपल्या बॅगपुरती तरी जागा मिळवतातच. स्वतः मात्र असेच फिरत रहातात नशीबाने मिळाली जागा की लगेच आपलं टेकायचं. असे सहप्रवाशी ट्रेनच्या नेहमीच्याच प्रवासात भेटत गेले. असो. काहीजण आठवणी राहिले नंतर विसरले.
एकदा मी कल्याण ते संभाजीनगर रेल्वेनी प्रवास करत होते मी माझा दहा वर्षाचा मुलगा आणि माझी लहान मुलगी असे तिघेजण आम्ही प्रवास करत होतो.
आमचे दोन शीटचे आरक्षण होते. मुलगी लहान होती त्यामुळे तिचे तिकीट नव्हते. बाजूला एकजण असे चौघेजण एका बर्थवर होतो. मी एकदम अलिकडे बसले होते. ट्रेन नाशिकरोडला थांबली आणि आमच्या डब्यात खूपच गर्दी झाली. कदाचित संध्याकाळी पाचसहा दरम्यान ऑफीस सुटण्याची वेळ त्यामुळे असेल. रेल्वेचा डबा अगदी खचाखच भरून गेला. डब्यात आल्यावर प्रत्येकजण थोडं टेकायला जागा मिळेल का ?असे प्रश्नचिन्ह चेहर्यावर ठेवून ठेवून ऊभे होते. माझ्या बाजुलाच एक बाई उभी होती. ती उभी असल्यापासून मला सारख्या ढोसण्या द्यायची. तिला कदाचित तिला वाटत होते मी जरा सरकून तिला बसायला द्यावे. तिच्या चेहर्यावर हावभाव पण तसेच दिसत होते. आम्ही आमच्या दोन शीटच्या आरक्षण मध्ये तिघे बसलो होतो. आणि आता या बाईला कुठे जागा देणार ? नंतर त्या बाईने मला थोडे सरकायला सांगितले, ते बघा एका वेगळ्याच अविर्भावात. मी काही तिला बसायला दिले नाही तेंव्हा ती अहो!चक्क मला ती म्हणाली, “काय माणूसकी हाय का नाय !”. नंतर पुर्ण प्रवासात ती माझ्याकडे अशी पहात होती की, तिच्याच रिजर्व आसनावर जणू मी बसले होते. ती उतरेपर्यंत माझ्याकडे रागाने पहात होती अगदीच साता जन्माचं वैर असल्या सारखे पहा. असो असतात असे ही काही प्रवासी समजा.
अशा या प्रवासात बरेच विचित्र प्रवासी भेटत असतात. गर्दीत कोणी ढोसण्या देणारे असते. कोणी उगी स्वत:चा तोल न आवरल्याने दुसर्याच्या अंगावर कोलमडणारे असते. कोणी आरामात खिडकीजवळची जागा भेटली की मस्त झोप काढणारे असतात. कोणी शेजारी बसलेलेल्या व्यक्तीबरोबर गप्पात रंगलेले असतात. कोणी पुर्ण प्रवास झोपेतच पुर्ण करणारे असतात. काही प्रवाशी तर इतके झोपाळू असतात बघा त्यांना त्यांचे उरण्याचे ठिकाण येऊन गेलेले माहीत नसते. प्रवासातील सहप्रवाशांसोबत असा गमतीशीर प्रवास सुरू असतो.
बसच्या प्रवासात प्रवाशांना घाई असते ती खिडकीच्या बाजूची शीट पकडण्याची. बस स्टॅडवर बस लागली रे लागली की, लगेच कोणी खिडकीतून आत रूमाल फेकतात, कोणी बॅग फेकतात. बापरे बॅग फेकताना तर बॅगचा चेंडू करून खिडकीतून आत बॅग कोंबली जाते. बसमधून प्रवासात या खिडकीचे मात्र खुपच किस्से पहायला मिळतात. अहो! त्या खिडकीसाठी चक्क भांडणे होतात. खिडकीच्या बाजूला बसलेल्या प्रवाशांचे एकमात्र असते त्यांना बसमधील इतर प्रवाशांसी काही घेणेदेणे नसते. खिडकी मिळाल्याचा एक वेगळाच आनंद त्यांच्या चेहर्यावर झळकत असतो. खिडकीतून बाहेर पहात आपल्याच विचारात त्यांचा प्रवास चालू असतो. कधीकधी काही प्रवासी आपल्यातच इतके दंग असतात की, बस वाहकाला (कंडक्टरला) ओरडून सांगावे लागते. झोपाळू प्रवाशांची तर गोष्टच न्यारी बघा!शेजारी बसलेल्या प्रवाशाला सांगून झोपतात, “ माझा स्टाॅप आला की, सांगा बरं !”असो
काही प्रवाशांना उगाच सवय असते, “काय कुठे चाललाय?, गाव कोणते ? “ अशा नसत्या चौकशा करायची पहा. मग समोरच्याला आवडेल न आवडेल असे काय नसतेच पहा! एकदा मी ‘ कारवार – पुणे ‘ बसने गावी इस्लामपूरला जात होते. मी खिडकीच्या बाजूला बसले होते. मला सुध्दा प्रवासात खिडकी खुप आवडते. माझ्या बाजूला एक बाई बसली होती. ती इतकी बडबडी होती की, काय बोलायचे कामच नाही. उगी स्वतः बद्दल न विचारता माहिती देत होती रस्त्यात येणाऱ्या गावांची नावे सांगत होती. काही गरज नसताना ज्यादा माहिती म्हणजे या गावात माझी मावशी, कुठे मामा, कुठे मुलगी रहाते. असे तिने गरज नसतानाची माहिती देऊन मला नुसते बेजार केले होते. एकतर ती कर्नाटकमधून असल्यामुळे तिचे बोलणे काही समजत नव्हतेच. तिला हिंदी निट बोलता येत नव्हते. मध्येच मराठी शब्द आला की, थोडेफार चेहर्यावर हासू आणून मी तिला इच्छा नसताना खोटानाटा प्रतिसाद देत होते. एकदाचे बेळगाव आले आणि ती उतरली आणि मी सुटकेचा नि:स्वास टाकला.
अजून एकदा कारवार-पुणे बसमधून मी गावी येत होते. बसमध्ये फार गर्दी नव्हती त्यामुळे मला खिडकी जवळ ऐसपैस जागा मिळाली. मला खिडकी मिळाली याचा फार आनंद झाला. माझा गावी जाण्याचा प्रवास चालू झाला. माझ्या बाजूच्याच शीटवरती एक पंधरा सोळा वर्षाची मुलगी बसली होती. अहो!काय सांगायचे तुम्हाला तिने नुसता माझ्या नाकात दम भरून सोडला. काय माहित सकाळी प्रातःविधि उरकून आली होती का नाही. एकदा तिला विचारले बाळा तू कुठे उतरणार आहेस. तिने सांगितले, “ पुणे “.
ती असे बोलताच मी माझी बॅग उचलून मागे दोन शीट सोडून बसले. वाचक हो ! हे असे ही प्रवासी भेटतात बरं.
बेळगाव नंतर एक सद्गृहस्थ बसमध्ये चढले. त्यांची पत्नीसुद्धा सोबत होती. त्यांच्या बोलण्यावरून वाटत होते ती त्यांची पत्नी असावी. त्यांची वेशभूषा पाहून तर ते चांगले सुशिक्षित वाटत होते. दोन आसनाची शीट असलेल्या प्रत्येकाला ते विचारत होते, ” तुम्ही जरा उठता का आम्हा दोघांना(ते आणि त्यांची बायको)येथे एकत्र बसता येईल “. आता बघा बसमध्ये आटापिटा करून मिळवलेली खिडकीजवळची जागा कोण बरे सोडेल? नंतर अजून दोघा- तिघांना विचारत
ते माझ्या शिटजवळ येऊन म्हणाले, “वो ताई तुम्ही दुसरीकडे बसता का ? “ मी तर आजपर्यंत कधीच लांबचा प्रवास खिडकी वाचून केला नव्हताच. मी सरळ नाही म्हणताच त्यांना इतका राग आला की, ते मला “ ही बॅग उचला येथून तिकडे सरकून ठेवा. पर्स तिकडे ठेवा बसमध्ये सगळेच सोयीचे कुठून आणायचे. “ असे ओरडून बोलू लागले. अहो!आधी विनंतीच्या सुरात शीट मागणारे गृहस्थ, आता एकदम तापलेच बघा!
आणि सोयीचे कोणाला पाहिजे पहा, हे ऐंशी ओलांडलेले गृहस्थ यांना बसमध्ये सुध्दा बायकोच्या बाजूलाच बसून प्रवास करायचा आहे. आता वाचक हो! “तुम्हीच सांगा सोयीचे कोण पहात आहे ते “ नंतर त्याची बायको माझ्या बाजूला बसली आणि ते गृहस्थ पुढील शीटवरती बसले. पण सारखे बेचैन होऊन मागे वळून पहायचे आणि नंतर दोन-तिन स्टाॅप गेल्यावर त्या दोघात मिळून एक शीट मिळाली. क्षणात त्या गृहस्थांच्या चेहर्यावर हासू फुलले. पुढे प्रवास चालू झाला. प्रवासात सुध्दा आपल्या जीवनसंगीनी, तिची घेतलेली काळजी मात्र यातून दिसून आली.
एकदा इस्लामपूर वरून सांगलीला जात होते. त्या दिवशी बहुतेक एमपीएससी ची परिक्षा होती त्यामुळे एसटीमध्ये इतकी गर्दी होती की, सरळ ऊभे सुध्दा रहाता येत नव्हते. जास्त करून मुलींची गर्दी होती. गर्दीत मी इकडे तिकडे कोलमडलेली पाहून एका भल्या मुलीने स्वतः उठून मला बसण्यास जागा दिली. त्यापण दोन आसनाच्या शीटवर तिघीजनी बसल्या होत्या. मला थोडे बसायला मिळाले याचे समाधान वाटले. पण अहो! काय सांगयचे बाजूला बसलेल्या मुलीने मला सांगली पर्यंत नुसते जेरीस आणले बघा शेतावर बांधाची हद्द असावी तसे ती बसली होती. जराही इकडे तिकडे सरकून नाही. तिने मला कोपरखळीने बेजार केले. कितीतरी वेळा मी विनंती केली की,
“जरा आत सरकून बस “पण तिने ऐकले नाहीच. शेवटी मला वाटले ऊभी होते तेच बरे होते. मी मनाची समजूत घातली असेल हिच्याशी, कोणत्या तरी जन्माचे हद्दीपायीचे वैर …. असो
इतर प्रवाशांसारखी मला सुध्दा प्रवासात खिडकी हवी असते. मग काही प्रवाशी खिडकीतून बाहेर पाहण्यात दंग होतात तर काही खिडकीतून येणाऱ्या थंडगार वाऱ्यात मस्त डुलकी काढतात. खिडकीतून बाहेरचा निसर्ग पाहण्यात माझा मात्र प्रवास पाहण्यात नेहमीच आनंददायक असतो. मी निसर्गाशी इतकी एकरूप होते की, प्रवास कधी संपतो याचे भान उरत नाही. आपल्या प्रवासा बरोबर धावणारी झाडे जणू प्रवासातील सहप्रवासीच असतात.
आजकाल प्रवासात लोक मोबाईल चाळण्यात खुपच व्यस्त असतात. त्यांना बसमध्ये कोणी आले, कोणी उतरले याचे भानच नसते. काही प्रवासी मस्त गाणी ऐकण्यात धुंद असतात. दुसरे म्हणजे प्रवास आणि किटकिट नाही असे नाहीच! अहो!चक्क एक-दोन रूपये करिता सुध्दा कंडक्टर सोबत भांडणारे लोक असतात बसमध्ये. कुणी कुणाचा धक्का लागला म्हणून किटकिट करते. तर कधी सामान ठेवण्यावरून भांडण होते. एखांदा प्रवासी असा भेटतो की, ओळखी काढून गावापर्य॔त जाऊन पोहचतो. जास्त करून बाईमाणूस असेल तर खुपच खोलाची विचारपूस चालू असते. कारण बाई माणूस गप्प बसणारे नसतात. कुठून ? कशा ? ओळखी काढून गप्पा-टप्पा करत प्रवासात वेळ घालवतात. सागळ्या नात्या-गोत्याची कुस उसवून काढतात. असो.
अशा काही विनोदी, काही भांडखोर, काही त्रासदायी, काही बडबडे तर काही गुपचुप असे अनेक प्रवासी माझ्या प्रवासात भेटत गेले. . काही प्रवासी पहिल्याच वेळेस पाहिले तरी फार पुर्वीची ओळख असल्याचे भासमान होते.
खात्री आहे येथून पुढेसुध्दा नक्कीच असे गमतीशीर, मजेदार, विनोदी असे प्रवासी मला प्रवासातील सहप्रवासी म्हणून भेटत रहातील अशी आशा आहेच. त्यांच्यासोबतच्या प्रवासातील अनुभव आणि आठवणी मनाला सुखद करून स्मरणीय रहातील. माझ्या गल्ली पासून ते दिल्ली पर्यंतच्या प्रवासात भरपूर प्रवासी भेटले. काही चांगले काही त्रासदायी, काही आठवणींतून राहिले. काहींना प्रवास संपताच विसरून गेले.
असे हे सगळ्या प्रकारचे, आपापल्या विविध स्वभावगुणांचे प्रवासी माझ्या प्रवासातील सहप्रवासी झाल्याबद्दल त्यांचे खुप खुप धन्यवाद
व्हाॅटस्ॲप वर आपण पाठवलेला एखादा मेसेज आपल्यालाच परत येतो. काहिवेळा तो थोड्या वेळातच येतो, तर काहिवेळा त्याला यायला वेळ लागतो. पण परत येतोच. हे मेसेजेस साधारण असतात. यात गुपित काहिही नसतं.
पण व्हाॅटस्ॲप यायच्या आधी आणि आता सुध्दा आपलाच आणि गोपनीय मेसेज आपल्यालाच परत मिळण्याचा अनुभव काहि जणांना आला असेल. कुणाला सांगू नका किंवा सांगू नकोस अशी सुरवात करून दबक्या आवाजात खणखणीतपणे सांगितलेली गोष्ट कधीकधी आपल्यालाच परत ऐकायला मिळते. कधी त्यात कशाची भर पडते तर कधी काही वगळलं जातं. वर परत कुणाला सांगू नका याची जोड असतेच.
यावेळी आपले चेहर्यावरचे भाव कमालीचे निरागस असतात. ठेवावेच लागतात.
कुणाला सांगू नका. अशी सुरुवात करून सांगितलेली गोष्ट दोन प्रकारची असते. एकतर ती खरंच कोणाला सांगायची नसते. आणि दुसरा प्रकार म्हणजे सगळ्यांनाच समजावी हि ईच्छा असते. पण मी सांगितली हे समजू नये असं वाटतं.
मग ती गोष्ट वरच्या दोनपैकी कोणत्या प्रकारची आहे हे आपणच ठरवतो. पहिल्या प्रकारची असेल तर एखाद्यालाच, जवळ कोणी नसतांना, त्याला जवळ करत सांगतो. त्यालाही आपण जवळचे आहोत याचा आनंद होतो. पण यात त्याच्या जवळचं पण कोणीतरी असेल याचा विसर पडतो.
दुसर्या प्रकारची असेल तर मग ती कुठे, कशी, आणि साधारण किती जणांना सांगावी हे ठरवतो. बर्याचदा ते ठरलेलंच असत, फक्त आपण सांगायच्या संधीची वाट बघत असतो. अशी संधी आली नाही तर ती आणतो.
कुणाला सांगू नका अशी सुरुवात करून सांगितलेली गोष्ट जे पहिल्यांदा ऐकतात त्यांच्या चेहर्यावर त्यावेळी योग्य ते भाव आणि प्रतिक्रिया असतात. पण नंतर मात्र ते कुुणाला सांगू नका यातलं नका हे ते सोयीस्कर विसरतात, आणि कुणाला सांगू….. अशी त्यांची अवस्था होते.
आणि त्या अवघड वाटणार्या अवस्थेतून बाहेर पडण्याचा एक मार्ग काढला जातो. आणि मग परत दबक्या आवाजात खणखणीतपणे ती गोष्ट पुढे सरकल्यावर थोड मोकळं वाटतं.
कुणाला सांगू नका यानंतर सांगीतलेल्या गोष्टीवर अरेच्या, काय सांगतोस, खरंच का, मला शंका होतीच, या सारखे अनेक उद्गार बाहेर पडतात. यात वाटत नाही तसं….. , असं म्हणतांना आपल्याला काय वाटतं याची चर्चा होते.
कोणाला सांगू नका हि गोष्ट माणसांना सांगीतली तरी ती स्त्री वर्गात पोहोचते. आणि स्त्री वर्गात सांगीतली तरी ती पुरुष वर्गात पोहोचते.
यावर जाऊ देत… आपल्याला काय करायचय….. यावर चर्चा संपलीतरी पुढे आपल्याच काहितरी करायचंय…. याची कल्पना काही जणांना होते. कारण त्यांनी काही केलं नाहीतर हा बातमीचा प्रवाह थांबणार तर नाही नां, अशी शंका त्यांना येते. आणि मग ती बातमी तशाच विश्वासू व्यक्तीला त्याच पध्दतीने सांगून ते आपलं मन मोकळं करतातच, पण त्या बातमीला वाहण्यासाठी मोकळंपण करतात.
कोणाला सांगू नका. यात नात्यांचा भेद नसतो. नात्यातल्या, मित्रांच्या, शेजारच्या, वरवर ओळख असणाऱ्या, तोंड ओळख असणाऱ्या, किंवा ओळख नसणाऱ्या अशा सगळ्यांच्या गोष्टींचा समावेश त्यात असतो. बर्याचदातर अरे ते….. ते नाहि का….. अरे तिथे कायम असतात…… आठवत नाही का. असं म्हणत त्यांची ओळख पटवून देण्याचा प्रयत्न होतो.
कोणाला सांगू नका…. ही कानातून पोटात गेलेली गोष्ट जास्तवेळ पोटात रहात नाही. ती परत तोंडातून बाहेर पडत कोणाच्यातरी कानातून त्याच्या पोटात जाते. आणि तिथून त्याच प्रकारे बाहेर पडते.
आत्ता मी काय सांगितलं यात खास असं काहीच नाही. आणि गोपनीय तर मुळीच नाही. त्यामुळेच कोणाला सांगू नका असं मुळीच म्हणणार नाही.
☆ “१५ आक्टोबर… वाचन प्रेरणा दिन…” ☆ प्रा.भारती जोगी ☆
📕📖📗📖📘📖📙
वाचून वाचावयास सांगावे , वाचून वाचवावे वाचल्याविण वाचाल कैसे सभ्य जन हो जो वाचतो तोच वाचतो, वाचून दुस-यास वाचवतो वाचणे वाचवण्यासाठी मन दृढ राहो. ||
-सुहास रघुनाथ पंडित, सांगली.
१५ ऑक्टोबर.! भारत रत्न डॉ. ए पी जे अब्दुल कलाम यांचा वाढदिवस. तो वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा केला जातो. त्या निमित्ताने….
रांगेत ठेवलेल्या पुस्तकांची पाने फडफडू लागली
अचानक हवा दार ढकलून थेट आत घुसली
हवे सारखी तू ही कधीतरी इथे ये -जा कर ना!
शांता शेळके
कपाटातले पुस्तक म्हणते, बंंधो झटक ना माझी धूळ
बाजूला सार तुझे ते यंत्रा-तंत्राचे प्रचंड खूळ
वाट पहातो तुझ्या भेटीची, मित्रा श्वास इथे कोंडतो
लडिवाळशा स्पर्शाची स्वप्ने कधीची मी रचतो!
मंडळी, ही साद आहे पुस्तकांची! विनंती वजा आर्जव आहे, कैफियत आहे!! विचार करून बघा की… ज्या पुस्तकांना स्पर्श करावा, त्यांच्याच संगतीत तासन् तास घालवू बघणारे आपण… आता तीच पुस्तके आपल्या एका स्पर्शासाठी व्याकुळली आहेत. आसुसलेली आहेत. धूळ त्याच्या वर ही साचली आहे आणि आपल्या मनावर ही बहुतेक!
कारण जी पुस्तके स्वतः च एक प्रेरणा होती, त्यांना उघडून वाचन करणे ही आपली एक अत:प्रेरणा होती. कुठे गेली ती? बदलत्या कालौघात वाहून जाते आहे की काय? हा विचार व्हायलाच हवा.
तंत्रज्ञान आले आणि सोशल मिडिया ची अलिबाबा ची गुहाच उघडली आपल्यासमोर. डोळे दिपले… आणि त्या झगमगाटाच्या तेजाने जणू झापडंच आली डोळ्यांवर. आणि हळूहळू आपला कासीम होणार की काय? अशी भिती वाटायला लागली आहे. या भयापासून योग्य अशा मार्गाकडे नेणारा मार्ग आहे… वाचन!!
“सर्जनशीलतेचा महामार्ग पुस्तकांच्या पाना-पानातून जातो”!
विसरू नका त्या पुस्तकांसाठी राजगृह बांधणा-या महामानवाला! आठवण करून द्या आजच्या भावी पिढीला त्या… तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्रीची… ज्यांनी वयाच्या १८ व्या वर्षीच स्वतः ला एक नियम घालून घेतला होता की… जेवढं वय तेवढी पुस्तके वाचायची!!
आणि ते आयुष्याच्या अंतापर्यंत, वयाच्या नव्वदी पर्यंत एक अतृप्त, अस्वस्थ वाचक म्हणूनच जगले. मृत्यूच्या अंतिम क्षणी त्यांच्या छातीवर उपडे पडलेले पुस्तक हेच सांगत होते,
माणसाला अंत आहे, वाचनाला नाही!
हे आहेत वाचन प्रेरणा देणारे खरेखुरे आयकॉन्स! आयडॉल्स!!
आज बदलत्या काळाबरोबर धावतांना, सोशल मिडियाचे बोट धरून चालतांना, आपला पुस्तकांचा धरलेला हात कधी, कसा सुटतच गेला. वाचनाची साधने बदलली. , माध्यम बदललं. फेसबुक, ट्विटर, ब्लॉग… यांनी आपल्या तना-मनाला व्यापून टाकलं. पण एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्यायला हवी की,
कक्षा, आयाम नवे आले, माध्यम बदलले तरी वाड्मय जिवंत राहिले.
या जिवंत वाड्मयाला ख-या अर्थाने अ-क्षर ठेवण्यासाठी आपल्याला वाचन चळवळ उभी करून, वाचकांचा सहभाग वाढवून, सुजाण वाचक घडवता कसे येतील हे बघितलेच गेले पाहिजे. वाचनाची प्रेरणा देणारे संस्कार देणारी संस्कृती रूजली पाहिजे, पाझरली पाहिजे… उतरली पाहिजे मना-मनात थेट… ” आंखोंसे जो उतरी है दिल में “… अशीच!!
वाचाल तर वाचाल… हे घोषवाक्य म्हणजे फक्त घोषणा न राहता, जीवनाच्या पाठ्यपुस्तकातला धडा ठरला पाहिजे, बोध मिळाला पाहिजे, घेतला पाहिजे त्यातून.
या घोष वाक्याचा मतितार्थ थेट भिडला पाहिजे.
वाचाल तर वाचाल याचा अर्थ…
वाचाल तर फुलाल
वाचाल तर शिकाल
वाचाल तर जगाल
असा समजून घेण्याची प्रेरणा दिली ही गेली पाहिजे आणि आपल्या अंत:प्रेरणेने ती घेता ही आली पाहिजे.
अगदी असं झालं पाहिजे की,
“लिहिणा-याने लिहित जावे
वाचणा-याने वाचत जावे
कधीतरी… वाचणा-याने लिहिणा-याचे शब्द घ्यावे! “
वाचनात इतकं सातत्य हवे की ते शब्द आपल्यासाठी.. सुरेश भट म्हणतात तसे… “पाहिले मी एवढे की, पाहणे सौंदर्य झाले.”… अगदी तसेच… वाचले मी इतके की, वाचणे सौंदर्य झाले!! इतकी एकात्मिक भावना वाचनाबद्दल प्रेरित व्हायला हवी.
वाचन तुम्ही ई-बुक, किंडल, मोबाईल, कशातून ही करा… पुस्तकांच्या फिरत्या, पलटत्या पानांशी असलेली मैत्री मात्र तुटू देऊ नका.
मातीला जसा एक पवित्र, धुंध करणारा सुगंध असतो ना, अंगचाच… अगदी तसाच गंध असतो पुस्तकाच्या पाना-पानातून दरवळणारा… ज्याच्या बद्दल गुलजार म्हणतात..