मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ मनाचे श्लोक – एक सार्वकालिक ‘मनोपनिषद’… – श्लोक ३५ आणि ३६ ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्री विश्वास देशपांडे

? इंद्रधनुष्य ?

☆ मनाचे श्लोक – एक सार्वकालिक ‘मनोपनिषद’… – श्लोक ३५ आणि ३६ ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्लोक क्र. ३५ 

असे हो जया अंतरी भाव जैसा|

वसे हो तयार अंतरी देव तैसा |

अनन्यास रक्षीतसे चापपाणी |

नुपेक्षी कदा राम दासाभिमानी|३५|

अर्थ :  आपल्या मनात परमेश्वराबद्दलचा जसा भाव असेल त्याप्रमाणे परमेश्वर आपल्या अंतरामध्ये वसतो म्हणजे त्याचे अस्तित्व जाणवते. अनन्यभावाने परमेश्वराला जो शरण जातो त्याचे रक्षण हा धनुर्धारी राम नक्कीच करतो. आपल्या भक्तांची तो कधीही उपेक्षा करत नाही.

(अनन्य – एकनिष्ठ, चापपाणी – हाती धनुष्य धारण केलेला /भगवंत.)

विवेचन : आधीच्या श्लोकात समर्थ देव आपल्या भक्तांचे रक्षण करतो असे आपल्याला सांगतात. या श्लोकात ते आपल्याला परमेश्वर कोणत्या भक्तांचे रक्षण करतो ते सांगतात. परमेश्वर सर्व प्राणीमात्रांच्या ठिकाणी वास करतो. परंतु त्याच्याबद्दलची आपली जाणीव किती तीव्र आहे यावर आपल्याला त्याची होणारी अनुभूती ठरते. भगवंताविषयीची भावना जर आपल्या अंतःकरणात तीव्र असेल तर तो प्रकट होण्यास वेळ लागत नाही.

या श्लोकात ‘भाव ‘ हा शब्द अतिशय महत्त्वाचा आहे. हा शब्द वेगवेगळ्या अर्थाने वापरला जातो. जसा भाव तसा देव किंवा देव भावाचा भुकेला असे आपण म्हणतो. कोणी भक्त स्वतःला परमेश्वराचा दास म्हणून घेतात समर्थ स्वतःला रामाचा दास म्हणून घेत असत. ही दास्यभक्ती. काही भक्त परमेश्वराला आपला पती समजून त्याची पत्नी भावाने आराधना करतात अशा प्रकारच्या भक्तीला मधुरा भक्ती असे म्हटले जाते. काही भक्त परमेश्वराला आपली आई मानून त्याची भक्ती करतात. ही वात्सल्य भक्ती. तर काही परमेश्वराला आपला मित्र किंवा सखा मानून त्याची भक्ती करतात. ही झाली सख्ख्य भक्ती. असे भक्तीचे म्हणजेच भावाचे विविध प्रकार आहेत. आपली भक्ती ज्या प्रकारची असेल तशा स्वरूपात परमेश्वर आपल्याला दर्शन देतो. त्या अनादी अनंत आणि निर्गुण निराकाराला कोणत्याही रूपात प्रकट होण्यासाठी अडचण नाही.

शेगावीचे महान संत श्री गजानन महाराज यांनी आपल्या भक्तांना वेगवेगळ्या स्वरूपात दर्शन दिले होते. कोणाला त्यांनी समर्थ रामदासांच्या रूपात दर्शन दिले तर कोणाला विठ्ठलाच्या रूपात. परमेश्वराने सुद्धा आपल्या भक्तांना त्यांच्या इच्छेप्रमाणे विविध रूपात दर्शन दिले आहे. अर्जुनाला तर त्याने विश्वरूप दर्शन सुद्धा घडवले. अडचण परमेश्वराकडून नाही. अडचण आपल्याकडून असते. आपल्या मनामध्ये तेवढा समर्पण भाव नसतो.

परमेश्वर कोणाचे रक्षण करतो या प्रश्नाचे उत्तर समर्थ श्लोकातील तिसऱ्या ओळीत देतात. ते म्हणतात, ” अनन्यास रक्षीतसे चापपाणी. ” अनन्य म्हणजे कोण हे समजून घेणे महत्त्वाचे आहे. एका परमेश्वराशिवाय आपल्याला दुसरा कोणताही आधार नाही, आश्रय नाही अशा प्रकारची भावना ज्याच्या मनामध्ये असते तो अनन्य भक्त ! अशा भक्तांचे तो धनुर्धारी राम रक्षण करतो.

आपली भक्ती ही सकाम भक्ती असते. आपण देवाची भक्ती केली म्हणजे देवाने आपले रक्षण करावे, आपल्याला सुख, समाधान, यश आणि ऐश्वर्य प्रदान करावे अशी आपली इच्छा असते. अर्थात त्यात फार काही चुकीचे आहे अशातला भाग नाही. परमेश्वर आपल्या संकटात जर धावून आला नाही तर आपली त्याच्यावरील श्रद्धा डळमळीत होते. मी एवढे देवाचे करतो परंतु काही उपयोग होत नाही असे आपण म्हणतो. परंतु याला परमेश्वराची अनन्यभावाने भक्ती म्हणता येणार नाही. मला इतर गोष्टी नाही मिळाल्यात तरी चालतील. मला फक्त परमेश्वर हवा आहे, त्याचे दर्शन हवे आहे अशा प्रकारची भावना जेव्हा आपल्या मनामध्ये तीव्रतेने निर्माण होईल तेव्हाच परमेश्वराचे दर्शन आपल्याला घडू शकेल. श्रीकृष्णाचा भक्त सुदामा आणि त्याची पत्नी श्रीकृष्णाचे अनन्य भक्त होते. त्यांच्यावर प्रपंचामध्ये अनेक संकटे आली, प्रचंड दारिद्र्य पाचवीला पुजले होते. मुलांना प्रसंगी उपाशी झोपावे लागत होते. परंतु परमेश्वरावरील त्यांची श्रद्धा कधीच डळमळीत झाली नाही. आपल्याला जे काही अन्न प्राप्त झाले असेल त्याच्यातीलच काही भाग बाजूला काढून ते परमेश्वराला अर्पण करत असत. आणि मगच स्वतः भोजन करीत. ही झाली अनन्यभक्ती. परमेश्वराने भलेही त्यांची परीक्षा पाहिली असेल परंतु अशा अनन्यभक्तांचे परमेश्वराने रक्षण केले आहे.

स्वसंवाद (नवीन) : 

१) माझी भक्ती कोणत्या प्रकारची आहे – दास्य, सख्य, वात्सल्य की मधुरा ? माझा नैसर्गिक भाव कोणता हे मी ओळखले आहे का ?

२) “जसा भाव तसा देव. ” माझ्या मनात परमेश्वराविषयी खरोखर कोणता भाव आहे ? दृढ श्रद्धा की केवळ भीती ?

३) सुदाम्याने दारिद्र्यातही आधी परमेश्वराचा वाटा काढला. तसा माझ्या जीवनात मी परमेश्वराला आधी प्राधान्य देतो का ?

४) “अनन्य” म्हणजे एकच आधार. माझ्या संकटात परमेश्वर हाच माझा खरा आधार आहे असे मला मनापासून वाटते का ? (क्रमशः)

– – – – – 

श्लोक क्र. ३६

सदा सर्वदा देव सन्निध आहे |

कृपाळूपणे अल्प धारिष्ट पाहे|

सुखानंद आनंद कैवल्यदानी |

नुपेक्षी कदा राम दासाभिमानी |३६|

अर्थ : परमेश्वर कायम आपल्याजवळच आहे. फक्त तो आपली परीक्षा आणि धैर्य पाहतो. सुख, आनंद आणि कैवल्य यांचा तो दाता आहे. असा हा परमेश्वर आपल्या भक्तांचा अभिमानी असून त्यांच्याकडे तो कधीही दुर्लक्ष करत नाही.

(सन्निध – समीप/जवळ, अल्प धारिष्ट – परीक्षा/कसोटी, कैवल्य – मोक्ष.)

विवेचन : आधीच्या श्लोकात समर्थ परमेश्वर आपल्या कोणत्या भक्तांचे रक्षण करतो ते आपल्याला सांगतात. तर या श्लोकात हा परमेश्वर कोठे आहे, त्याचा वास कोठे आहे हे ते आपल्याला सांगतात. ते म्हणतात सदा सर्वदा देव सन्निध आहे म्हणजे जवळच आहे. व्यवहारामध्ये आपण सन्निध या शब्दाचा अर्थ जवळ किंवा समी र असा घेतो परंतु अध्यात्मामध्ये सन्निध म्हणजे अंतर्यामी. त्या परमेश्वराला शोधायला दूर कुठेही जावे लागत नाही. त्याचा वास आपल्या अंतर्यामीच असतो. आणि तिथे तो सदा सर्वदा म्हणजे कायमस्वरूपी असतो. दुसऱ्या शब्दात सांगायचे झाले तर परमेश्वर आणि आपण वेगळे नाहीच आहोत.

असे जर आहे तर मग आपल्याला त्याचे अस्तित्व का जाणवत नाही ? आपली देहबुद्धी एवढी प्रबळ असते की त्यामुळे हा देह म्हणजे मी नाही आणि आपल्या अंतरात्म्यात त्याचा वास आहे हे आपल्याला जाणवतच नाही. सकाळी उठल्यानंतर आपण ” कराग्रे वसते लक्ष्मी, कर मध्ये सरस्वती, करमूले तू गोविंदम प्रभाते कर दर्शनम्” हा श्लोक म्हणतो त्याचा अर्थ हाच आहे. आपल्या अंतर्यामी परमेश्वर वसतो आहे.

आपल्याला त्याचे अस्तित्व जाणवत नाही परंतु साधकांना मात्र पदोपदी त्याच्या अस्तित्वाची जाणीव होते. आपण आपले मूळ स्वरूप विसरल्यामुळे आपल्याला त्याच्या अस्तित्वाची जाणीव होत नाही. परंतु तुकाराम महाराजांसारखे संत ईश्वर चिंतनातच रममाण झालेले असल्यामुळे त्यांना स्वतःचे असे वेगळे अस्तित्व नसते. परमेश्वर कायम आपल्याबरोबरच आहे याची जाणीव त्यांना होत असते. म्हणूनच ते म्हणतात, ” जेथे जातो तेथे तू माझा सांगाती |चालविशी हाती धरुनिया ||

परंतु परमेश्वराची अशी कृपा होण्याआधी तो आपली परीक्षा पाहतो. ही परीक्षा पाहण्यामागे आपल्या भक्ताला मानसिक दृष्ट्या खंबीर करावे, आपल्या कृपेसाठी पात्र करावे अशीच सध्या भगवंताची इच्छा असते. आई आपल्या मुलाला चालायला शिकवते. पण कधी कधी त्याचे धरलेले बोट सोडून देते. एखादेवेळी तो पडेल हे तिला माहिती असते. परंतु त्याला स्वतःला चालता यावे, तो स्वावलंबी व्हावा म्हणून ती हे करत असते. अनेक संतांनी सुद्धा आपल्या अनुयायांना अनुग्रह देण्यापूर्वी त्यांची परीक्षा पाहिली आहे. आपल्या कृपेसाठी आपला शिष्य पात्र आहे की नाही याची खात्री झाल्यानंतरच गुरु त्याच्यावर कृपा करतात. प्रत्यक्ष जीवनात सुद्धा यशस्वी होण्यासाठी आपल्याला नाना प्रकारच्या परीक्षा उत्तीर्ण व्हाव्या लागतात. पण ज्याला पुढे जायचे आहे तो अशा प्रकारच्या परीक्षांना, संकटांना न डगमगता सामोरा जातो.

तसेच भगवंताच्या एकनिष्ठ भक्ताचे आहे. “देह जावो अथवा राहो, पांडुरंगी दृढ भावो” अशी त्याची वृत्ती असते. खरा भक्त संकटप्रसंगी डगमगत नाही. परमेश्वरावरील त्याची श्रद्धा अविचल असते. परमेश्वराचा भक्त असलेल्या छोट्या प्रल्हादावर अनंत संकटे येतात. परंतु तरीदखील परमेश्वरावरील त्याची श्रद्धा ढळत नाही. मागील श्लोकात समर्थ आपल्याला जी अनन्यभक्ती सांगतात ती हीच !

अशी आपली त्याच्यावर संपूर्ण निष्ठा असली आणि त्याने घेतलेल्या परीक्षेत एकदा का आपण उत्तीर्ण झालो की मग त्याच्या कृपेचे जणू भांडारच खुले होते ! अनंत हस्ते कमलावराने देता किती घेशील दो कराने अशी भक्ताची अवस्था होते. सुख, समाधान, आनंद आणि कैवल्य म्हणजे मोक्षमार्गाचा दाता असलेला परमेश्वर आपल्याला या सर्व गोष्टी सहजच प्रदान करतो.

स्वसंवाद : 

१) “परमेश्वर अंतर्यामी आहे” हे मी जाणतो पण माझ्या दैनंदिन जीवनात मला त्याची प्रत्यक्ष जाणीव होते का ?

२) आईने बोट सोडले तरी ती दूर नसते. माझ्या संकटकाळात परमेश्वराबद्दल अशी भावना माझी असते का ?

३) परमेश्वर परीक्षा पाहतो हे मान्य आहे. माझ्या आयुष्यातील समस्यांकडे मी त्या दृष्टीने पाहतो का ?

४) “अनंत हस्ते” देणारा भगवंत आहे. मग मी त्याच्याकडे क्षुल्लक गोष्टींचीच मागणी करत राहतो का ? 

– क्रमशः श्लोक ३५ आणि ३६.

© श्री विश्वास देशपांडे

चाळीसगाव

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “समिधाच सख्या या!!” — रत्नावली – लेख क्र. ५ ☆ प्रा.भारती जोगी ☆

प्रा.भारती जोगी

? इंद्रधनुष्य ?

☆ “समिधाच सख्या या!!” — रत्नावली – लेख क्र. ५. ☆ प्रा.भारती जोगी ☆

(चित्र पुढील माहितीनुसार काल्पनिक.)

निसर्गाने रौद्र रूप धारण केलेले… भयंकर पाऊस सुरू… कालिंदी नदीला महापूर आलेला… आणि अशा या प्रतिकूल परिस्थितीत अर्ध्या रात्री एक तरूण पती माहेरी गेलेल्या पत्नीच्या आठवणीत विरहदग्ध, मिलनातूर, विकल मनाने वेड्यासारखा थेट पोचतो पत्नीच्या माहेरी, तिच्या पुढ्यात… सामोरा!! नदी पार करतांना काष्ट समजून एका मानवी शवाचा आधार घेत, भिंतीवर चढण्यासाठी दोर समजून सापाला धरून… बेभान अवस्थेत!! 

पत्नी चकीत होते… पण दुसऱ्याच क्षणी सत्य कळल्यावर, तिला आपल्या रूप आणि यौवनाचा धिक्कार करावासा वाटला. आणि तिच्या तोंडून उद्विग्न उद्गार बाहेर पडले…

लाज न लागत आपको, दौरे आहे साथ, 

धिक धिक ऐसे प्रेम को, कहा कहौ मैं नाथ !! 

आणि असा धिक्कार करत तिनं पुढे त्याला ही उन्मादावस्थेतून जागं केलं…

अस्थि चर्ममय देह, यांमे ऐसी प्रीती

जो होती रघुनाथ मंह, होती न तो भवभीती!! 

आपल्या पतीला हे असे खडे बोल सुनावणारी ही सुंदर रूप यौवना, युवती होती… रत्नावली!!! 

आणि तो युवक, तिचा पती होता… तुलसीदास उर्फ रामबोला!!! 

रत्नावली… सौंदर्य आणि बुद्धी दोन्हीं लेऊन आलेली एक धर्मपरायण युवती ! जी लावण्यम् अंतर्मन: ही होती. म्हणूनच तिने दाखवून दिले की, भारत देशातील नारी; तिने ठरवलं तर आपल्या पतीला युवावस्थेच्या उन्माद क्षणांमधून ईश्वर भक्तीकडे उन्मुख करण्यास सक्षम असते.

रत्नावली चे हे शब्द तुलसीदास ने ऐकले आणि त्याच्या मनावरील उन्माद, मोह, भ्रांती या सगळ्याचा पडदा दूर झाला. पूर्वजन्मीचे संस्कार प्रदिप्त झाले. आणि आता डोळ्यांसमोर श्रीरामाचे मंगलकारी शुभ रूप, संपूर्ण सौंदर्यासहीत दृग्गोचर झाले. आणि तो निघाला विरक्ती च्या वाटेवर, संन्यस्त वृत्ती ने, प्रभु रामचंद्र च्या कृपादृष्टी च्या लाभासाठी! 

रत्नावली जिने दाखवून दिलं की, प्रेम जेव्हा ईश्वरा प्रती नेणारे असते तेव्हा ते एक गहन परिवर्तन, एक उच्चतम आव्हान स्वीकारायला तयार असते. आणि म्हणूनच समर्पित जीवन स्वीकारायला ही तयार असते.

रत्नावली ने एक चैतन्य तुलसीदास च्या मनात चेतविले. त्याच्या चेतनेला जागवलं… आणि तुलसीदास ला ही… या… समिधेच्या शब्दस्पर्शातलं स्फुल्लिंग जाणवलं! त्याला कळलं… हाच तो क्षण! हीच ती वेळ!!! काम कडून राम कडे जाणाऱ्या भक्ती मार्गावरील जीवनयात्रा सुरू करण्याची!! तुलसीदास पुन्हा वळून न पाहण्यासाठी, निघून गेला त्या वाटेला! एक गृहस्थ, संन्यासी झाला.

त्याच्या हातून रामचरितमानस या महान ग्रंथाचं, आणि अशाच अनेक ग्रंथांचे सृजन झालं. घरा-घरात राम भजन निनादलं! तुलसीदास संत तुलसीदास पदाला पोहोचला.

पण… या सगळ्यात सगळ्यांनाच विसर पडला त्या पहिलं चैतन्य स्फुल्लिंग चेतवणा-या समिधेचा! रत्नावली ख-या अर्थाने गुरू ठरली तुलसीदास ला योग्य मार्गदर्शन करणारी, त्याला राम भेटवणारा योग्य मार्ग दाखवणारी! किती महान स्त्री म्हणावी ती… जिच्या हृदयात अगाध भक्ती भाव तर होताच, पण पतीवर ही प्रगाढ प्रेम होतं! म्हणूनच तर तिच्या दिव्य दृष्टीला आपल्या पतीचं दिव्यत्व जाणवलं ना! 

हे विसरून कसं चालेल की…

रत्ना नसती तर तुलसीदास सारखं रत्न झालंच नसतं, आणि तुलसीदासला ही राम रतन धन प्राप्त झालंच नसतं! 

रत्नावली ने दाखवून दिलं की, खरं प्रेम तेच, जे ईश्वरा जवळ घेऊन जाते. 

रत्नावली चं एकाकी जीवन स्विकारण्याचं पेललेलं आव्हान उपेक्षून नाहीच ना चालणार!! 

शेवटी तीसुद्धा एक स्त्री च होती. तिला ही वाटलंच असेल ना, की पतीने प्रपंच आणि परमार्थ दोन्ही साधून जीवन आपल्याबरोबर व्यतीत करावे!! तो असा कायमचा त्यागून निघून जाईल, हा तिच्या साठी धक्काच होता. एक आव्हान तिने पेरलं पतीच्या मनात, तर एक आव्हान तिच्या ही वाट्याला आलंच पेलण्यासाठी! एकाकी जीवन, आजीवन जगण्याचं! 

मग रत्नावली ने आपलं एकटेपणाचं दु:ख, ती बोचणारी सल, ती विरह व्याकुळ, झुरणा-या मनाची विकल अवस्था तिने… अनेक, असंख्य दोह्यांत, झरझर वाहणा-या अश्रूंच्या साक्षीने प्रतिबिंबित केली. वियोगाचं दु:ख स्पष्ट दिसतं त्यांत!! इतकंच नाही तर, रत्नावली च्या ज्ञानाचं, विद्वत्तेचे ही प्रतिबिंब दिसतं त्यात! तिचे दोहे, त्यांची भाषा आणि त्यांतील भाव हे दोन्ही उच्च कोटीचे आहेत. काही ठिकाणी तर तुलसीदास पेक्षाही उत्कृष्ट आहे, सरस आहे ती! पण तिची ही काव्यप्रतिभा उपेक्षितच राहिली. मुळात प्रत्येक यशस्वी पुरुषामागे खंबीरपणे, ठामपणे उभी राहणा-या स्त्री चा त्याग, समर्पण, एकाकीपण, तिचं मोठेपण… नेहमीच अलक्षित, उपेक्षित, दुर्लक्षित राहतं! 

तीच उपेक्षा रत्नावली च्या ही वाट्याला आली.

पण हे विसरून चालणार नाही की…

रत्नावली ने पतीला धिक्कारले नसते तर रामबोलागोस्वामी तुलसीदास कसा बरं झाला असता?? 

 पतीच्या मनात रामभक्तीचं स्फुल्लिंग चेतवणारी, चैतन्य जागवणारी, तेजोमयी समिधा च ना ही रत्नावली!! 

रत्ना अगर ना होती तो तुलसी जैसा रतन नहीं होता!

– लेख क्र. ५.

© प्रा.भारती जोगी

पुणे.

 फोन नंबर..९४२३९४१०२४.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ किती सुंदर भांडण!… कवयित्री: अज्ञात ☆ प्रस्तुती : रेखा जांबवडेकर ☆

रेखा जांबवडेकर

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ किती सुंदर भांडण!… कवयित्री: अज्ञात ☆ प्रस्तुती : सौ. रेखा जांबवडेकर 

किती सुंदर भांडण !

(घरोघरी चालणारं,

डोळ्यात आनंदाश्रू आणणारं!)

 

माझे भांडखोर आई-बाबा

 

लहानपणापासून बघतेय मी,

आई-बाबा सतत भांडायचे,

आता सत्तरी उलटली तरीही,

तेच सुरू त्यांचे !

 

खूप दिवसांनी, दोन दिवसांसाठी,

गेले होते मी माहेरी,

बाबा बाहेर गेल्या गेल्या,

आईच्या सुरू झाल्या तक्रारी.

 

रोज सकाळी सकाळी तुझे,

बाबा जातात फिरायला,

मी ही जाते, कोपऱ्यापर्यंत,

त्यांना रस्ता क्रॉस करून द्यायला.

 

कानाला काहीतरी बांधा म्हणते,

किती गारठा असतो हल्ली,

ऐकत तर नाहीतच,

वर उडवतात माझीच खिल्ली.

 

रोज ह्यांच्या मित्रांपैकी आणतं,

कुणीतरी काहीतरी खायला,

बॉर्डरलाईन शुगर आहे आपली,

आता सांभाळून नको का राहायला ?

 

घरी आल्यावर खुशाल बसतात

तासभर वाचत पेपर,

धुणेवाली बाई निघून गेली तर,

पुन्हा माझ्याच डोक्यावर खापर !

 

ऐन बाराच्या उन्हात म्हणतात,

जरा बँकेत जाऊन येतो,

एन्ट्री आणतो, बिलाचं बघतो,

अन देवाला दोन हार घेतो ”.

 

अमेरिकेतून तुझा भाऊच इथले,

सांभाळतो, ग, सगळे व्यवहार,

पण ‘मी’ उन्हात नका जाऊ म्हणाले,

की हे जाणार, म्हणजे जाणार !

 

तुझ्या ताईने ‘मोबाईल’ घेऊन दिलाय,

इमर्जन्सीत सोबत असावा म्हणून,

तेव्हढा बरोब्बर घरी विसरतात,

कितीही सांगा शिरा ताणून !

 

इतकी वर्ष सांगतीये तरीही,

तितकेच भरभर जेवतात,

वाघाच्या अन ह्यांच्या शर्यतीत,

अजूनही हेच जिंकतात.

 

रोज संध्याकाळी मुलांच्या फोन्सची

वाट बसतात बघत,

मी म्हणते, ‘’अहो, मुलं बिझी असतात, ”

तरीही घुटमळतात येरझाऱ्या घालत.

 

परवा म्हणे, ”पंखा पुसतो, ”

अन घेतलं स्टूल चढायला,

आता ह्यांचं का वय राहिलं,

असली कामं करायला ?

 

तेव्हढ्यात बाबा आले फिरून,

म्हणाले, ”चला वाढा ”,

मी काही बोलणार, तितक्यात,

बाबांनी, सुरू केला त्यांचाही पाढा.

 

नका करत जाऊ, ‘स्वतः’ चार जिन्नस,

सांग जरा तुझ्या आईला,

फुकटचा का पगार द्यायचा,

स्वैपाकाच्या बाईला ?

 

खावं-प्यावं, मजेत राहावं,

कशाला ते धरावे उपास,

आता काय मिळवायचं राहिलंय,

आता कशात होणार नापास ?

 

अजून एक तिला समजावून सांग,

ती घेत नाही नीट औषधं-गोळ्या ”,

आई म्हणाली आतून, ”चला,

झाल्यात गरम-गरम पोळ्या ”.

…………………………..

………………………….

केला मी देवाला नमस्कार,

डोळ्यांतून अश्रू सांडत,

म्हटलं,

देवा, ह्या दोघांना,

असेच ठेव भांडत !”

 

अगदी हृदयास स्पर्शून गेले हे भांडण.

फक्त आपल्या पिढीपर्यंतच मर्यादित राहील का हे भांडण?

 

माहीत नाही या बाबतीत कोणाचे काय मत आहे मात्र या भांडणात पती- पत्नी संबंधात जो गोडवा आहे तो जगात कोणत्याच संबंधात दिसत नाही.

 

पति – पत्नी एकमेकांस किती पूरक असतात, याचे हे भांडण ज्वलंत उदाहरण आहे.

तसे पाहता हे भांडण जरूर आहे परंतु यात प्रेम भरभरून आहे हे मात्र तितकेच खरे.

कवयित्री:अज्ञात

प्रस्तुती :सौ. रेखा जांबवडेकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ “तिच्या कथा (लघुकथा संग्रह)” – लेखिका : मानसी म्हसकर ☆ परिचय – राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

?पुस्तकावर बोलू काही?

☆ “तिच्या कथा (लघुकथा संग्रह)” – लेखिका : मानसी म्हसकर ☆ परिचय – राधिका भांडारकर ☆ 

पुस्तक :  तिच्या कथा (लघुकथा संग्रह)

लेखिका : मानसी म्हसकर

प्रकाशक : अक्षर शिल्प प्रकाशन.

प्रथम आवृत्ती : ५ एप्रिल २०२६

नुकताच अक्षरशिल्प प्रकाशनातर्फे (शेगाव) प्रकाशित झालेला “तिच्या कथा” हा नवोदित लेखिका सौ. मानसी म्हसकर, वडोदरा यांचा लघुसंग्रह वाचनात आल्या. लेखिका मराठी असल्या तरी गुजराथ स्थित आणि गुजराथी भाषेचा पगडा असूनही त्यांनी मायबोलीत आत्मीयतेने केलेलं सुंदर मराठी लेखन वाचून मी खरोखरच प्रभावित झाले.

या कथासंग्रहात दहा कथा आहेत. आणि पुस्तकाच्या शीर्षकानुसार त्या सर्व कथा “तिच्या कथा” आहेत. स्त्रीवादी कथा आहेत. विषयात आणि कथा उलगडण्याच्या पद्धतीत मात्र वैविध्य आहे. एकदा पुस्तक वाचायला घेतले की ते संपूर्ण वाचल्याशिवाय ठेवावेसेच वाटत नाही हा या पुस्तकाचा पहिला यशाचा टप्पा.

द्वंद्व ही या संग्रहातील पहिलीच कथा.

एक वेगळाच विषय.

एक मुलगा, आपण “गे” असल्याचा आणि एका मुलाच्या प्रेमात असल्याचा आणि त्याच्याशी लग्न करण्याचा त्याने घेतलेला धक्कादायक निर्णय त्याच्या आईला प्रांजळपणे सांगतो आणि तिथूनच आईच्या मनातलं द्वंद्व सुरू होतं. मातृत्व की समाज, निसर्ग की समाजाचे नियम या विचारात अडकतं. आईच्या मनातला हा विदारक, भावनिक आणि निर्णयात्मक प्रवास अत्यंत प्रभावीपणे लेखिकेने वर्णिला आहे.

माणुसकी

ही एक भयकथा आहे म्हणायला हरकत नाही. कथेतला नायक एका भयाण काळोखी रात्री सायकलवरून घरी चाललेला असतो. घरी त्याची मुलगी आजारी असते. तिच्याच विचारात चालला असताना एक गूढ घटना घडते आणि आपण एका भूताला घेऊन सायकल वरून प्रवास करत आहोत याची जेव्हा त्याला जाणीव होते त्यानंतर कथेला एक वेगळं वळण मिळत जातं. मनाला खिळवून ठेवणारी ही कथा आहे.

घटना

ही कथा खरोखरच तशी रहस्यमयच आहे. अविश्वासनीय घटना यात घडलेल्या आहेत. शेवट नकारात्मक आहे. घटनाक्रम, त्याविषयीचे वर्णन वगैरे पद्धतशीर असले तरी एकंदर ही कथा मनाची पकड घेत नाही.

याचसाठी केला होता अट्टाहास

कथा खूप सुंदर. लग्नानंतर बऱ्याच वर्षांनी नवसासायासाने झालेल्या मुलाला वाढवताना केलेले अवास्तव लाड, त्याच्या चुकांवर घातलेली पांघरूणं आणि परिणामी “आपण काहीही केले तरी आपली आई आपले संरक्षण करेलच” या घमेंडखोर मानसिकतेमुळे मुलात बळावलेली गुन्हेगारी वृत्ती आणि त्यातूनच त्याच्याकडून एका कोवळ्या मुलीवर झालेला अत्याचार अखेर आईच्या डोळ्यावर बांधलेली प्रेमाची पट्टी सोडवण्यास कारणीभूत ठरते. आणि त्याच क्षणी आपल्या मुलाला माणूस म्हणून घडवण्यात आपल्यातली आई कमी पडली याची जाणीव तिला होते. समाजात घडणाऱ्या नीच घटनेवर या कथेत, लेखिकेने अतिशय प्रभावी भाष्य केले आहे. आई-पणाच्या हळवेपणातून बाहेर येऊन घेतलेला तिचा निर्णय म्हणजे या कथेतून दिलेला एक सुंदर संदेश ठरतो.

अर्जुनाचे झाड

ही कथा सुद्धा खूप छान आहे. छान लिहिली गेली आहे. आजी- नातीतल्या, झाडांची माहिती देण्यानिमित्त सुरू झालेल्या संवादापासून ते थेट “आजीचा बटवा” या आयुर्वेदिक औषध उद्योगापर्यंत पोहोचलेल्या विद्या नावाच्या एका महिलेची ही यशस्वी कहाणी आहे, लेखिकेने ही कहाणी अतिशय सुंदर रंगवली आहे. आजी नात आणि अर्जुनाच्या झाडावरचे फूल यांच्या मधल्या भावनिक नात्यांची सुरेख गुंफण लेखिकेने या कथेत केली आहे आणि त्याचबरोबर आयुर्वेदिक औषधांचे महात्म्यही मांडलं आहे.

परतफेड

परतफेड ही कथा दीर्घ आहे. ५ भागात लिहिलेली आहे. विवाहबाह्य संबंधावर असलेली कथा असूनही यात कुठेही अश्लीलपणा नाही. लेखिकेने एका ठराविक संस्कृतीच्या चौकटीत नायिकेच्या मनाचे विश्लेषण सुंदर पद्धतीने केले असल्यामुळे न पटणाऱ्या बाबीही वाचकाला स्वीकारणे भाग पडते, “असंही असू शकतं, होउ शकतं असा विचार मनात येतो. एकंदर विषयानुसार कथानकाची मांडणी सुरेख झालेली आहे.

कादंबरी

अतिशय सुंदर कथा. एका स्त्रीच्या संघर्षाची, जिद्दीची, सकारात्मक आणि सुखांत कथा.

आवडलेलं वाक्य— वास्तुशांती फक्त घराची नसते मनाची ही करावी लागते

स्वीकार

छानच कथा. सासू- सुनेच्या सुरुवातीच्या दुराव्याची आणि नंतर वात्सल्यात रूपांतर झालेल्या सुंदर नात्यांची गुंफण या कथेत वाचायला मिळते. गैरसमजुतीमुळे नात्यात कसा दुरावा निर्माण होऊ शकतो हे लेखिकेने सुरेख पद्धतीने मांडलेले आहे. त्याच नात्यात गोडवा निर्माण होतानाचं लेखन अगदी स्वाभाविकपणे आणि भावूक शैलीत त्यांनी केलेलं आहे. या कथेत मांडलेली सासु-डे आणि सून-डे ही कल्पनाही आवडली.

बस क्रमांक १०८

आई-वडील बहिणींची जबाबदारी स्वीकारत लग्न करायचं राहून गेलेल्या एका स्त्रीची ही कहाणी आहे. रोज बस क्रमांक १०८ मधून लोकल प्रवास करताना भेटणारी माणसं टिपण्याचा, त्यांच्या अंतरंगात शिरून अथवा त्यांच्याशी होणाऱ्या संवादातून, तिच्या हातून चक्क कथा निर्मिती होते. तिच्या कथा सर्वत्र वाचल्या जातात. तिच्या कथांना पुरस्कारही मिळतात आणि या माध्यमातून तिला आनंदी जीवन जगण्याचा एक मंत्र मिळतो. लहानसं साधंच कथानक पण त्यातली वास्तवता लेखिकेने रंजकतेने मांडली आहे. कथा नक्कीच वाचनीय आहे.

१० रिकामी घागर

ही कथा वाचताना मन खरोखरच विदीर्ण होतं. त्याचबरोबर या कथेतून, स्त्रिया एकत्र आल्या तर काय चमत्कार घडवू शकतात असा महत्वपूर्ण संदेशही लेखिकेने दिला आहे.

एक गाव, गावाभोवती वाहणारी नदी आणि पाणवठ्यावर जमणाऱ्या, आपापली दुःखे मनात घेऊन पाणी भरण्याच्या निमित्ताने नदीकाठी जमून मनाला हलकं करू पाहणाऱ्या गावातल्या महिला. त्यांच्यातलीच एक विधवा कुंदा नावाची महिला. एक दिवस एका नराधमांकडून तिच्यावर अतिप्रसंग होतो त्यातूनच तिला दिवस राहतात आणि त्यानंतरचा कुंदावहिनीचा संघर्ष, निर्णय आणि त्या निर्णयास एकजुटीने साथ देणाऱ्या तिच्या सख्या.. रिकामी घागर नावाचे आंदोलन उभारून गाव पंचायतीचा निर्णय कसा बदलायला लावतात याची काळीज फाडणारी ही कथा आहे.

रिकामी घागर हे स्त्रीच्या मातृत्वासाठी वापरलेलं रूपकात्मक शीर्षकही खूप बोलकं आहे.

एकंदर हा दहा कथांचा सुंदर संग्रह.

मा. मानसी म्हसकर यांनी विविध विषयांच्या माध्यमातून स्त्रीच्या व्यथा मांडत त्यावर उपायही सुचवत वाचकांना विचार करायला लावले आहे.

लेखिकेची साधी, सरळ, ओघवती भाषाशैली, वर्णनात्मक लेखन पद्धती, मनोविश्लेषणात्मक लेखन क्षमता, कथानकाची सुयोग्य मांडणी हे प्रत्येक कथेचं वैशिष्ट्य ठरतं. त्यातून त्यांची संवेदनशीलता आणि वैचारिकता जाणवते.

पुस्तकाच्या शीर्षकाप्रमाणेच या तिच्या कथा आहेत पण यातली ती कणखर आहे, जिद्दी आहे, चिकाटीची आहे कोसळणारी नाही आणि खरोखरच पुस्तकाच्या मुखपृष्ठावर साकारलेल्या झाडासारखीच वादळ वाऱ्याशी, ऊन पावसाशी झगडत, तिच्याच मातीत पाय घट्ट रोवून उभी आहे. निर्णयक्षम आहे. हे सुंदर मुखपृष्ठ लेखिकेचे चिरंजीव शालीन म्हसकर यांच्या कल्पनेतून साकारलं आहे.

मा. प्रसाद देशपांडे यांनी या संग्रहाला सुंदर प्रस्तावना दिली आहे. त्यांच्या मतानुसार खरोखरच स्त्रीच्या भावनांचे, नात्यांचे, आणि निर्णयांचे अनेक स्तर या कथांतून उलगडले जातात.

मानसीताई, मनोगतात तुम्ही म्हटलंय, ”स्त्रीमनातील भावविश्व आणि तिच्या निर्णय क्षमतेचा प्रवास शब्दबद्ध करण्याचा प्रयत्न केलाय. ”

मानसीताई! तुमचा प्रयत्न नक्कीच यशस्वी ठरला आहे.

मलपृष्ठावर शालीनने व्यक्त केलेले आई विषयीचे अभिमानाचे उद्गारही मनाला भिडतात.

अभिनंदन मानसी! आणि पुढील साहित्यिक वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा!

परिचय –  सौ. राधिका भांडारकर

ई ८०५ रोहन तरंग, वाकड पुणे ४११०५७ मो. ९४२१५२३६६९ radhikabhandarkar@yahoo.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मराठी कविता ☆ कवितेच्या प्रदेशात # ३१२ ☆ मैत्र… ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

सुश्री प्रभा सोनवणे

? कवितेच्या प्रदेशात # ३१२ ?

☆ मैत्र… ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

हे तुझे दुटप्पी वागणे नव्हे बरे

सूज्ञ तू तुला समजावणे नव्हे बरे 

 *

बेगडी तुझे सारे विचार साजणी

नेहमीच संधी साधणे नव्हे बरे

 *

वागणे तुझे वा-यापरीच स्वैरसे

स्वार्थ सोहळे जोपासणे नव्हे बरे

 *

शब्द शस्त्र आहे लागता मनावरी

डंख नित्य सकळा मारणे नव्हे बरे

 *

जर नसे जिवाला शांतता “प्रभा” तिथे

मैत्र हे असे सांभाळणे नव्हे बरे

© प्रभा सोनवणे

संपर्क – “सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार

पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011

मोबाईल-९२७०७२९५०३,  email- sonawane.prabha@gmail.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ माझा संसार… ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆

सुश्री नीलांबरी शिर्के

? कवितेचा उत्सव  ?

☆ माझा संसार सुश्री नीलांबरी शिर्के 

माझा संसार संसार

तवा तापे गॅसवर

मसाला वाटताना

होई मिक्सरची घरघर!!

सखे माझ्या या संसारी

नाही म्हातारी कोतारी

वृद्धाश्रमी पाठवून

सुख शांती लाभे घरी!!

लॅडस्केप बोनसाय

सजवीले घरीदारी

जागा नाही खर्च केली

देवाच्या ग मी देव्हारी!!

माझ्या संसाराला ठेका

डिस्को पाॅप संगिताचा

मिळणार नाही तुला

शब्द येथे आरतीचा!!

सांभाळाया मुलांना ग

बाई खास आहे घरी

काय म्हणते संस्कार

आपोआप होतात ग

मोबाईल टि व्ही वरी!!

माझ्या कपाळीच कुंकू

नाही लालच रंगाच

त्याच कसब ग मोठ

ड्रेससंगे रंगायाच!!

सखे संसार संसार

नाही सुखा पारावार

रूढवादी संस्कारांना

जागा नाही टिचभर!!

©  सुश्री नीलांबरी शिर्के

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /मंजुषा मुळे/गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “ज्येष्ठत्वाकडून श्रेष्ठत्वाकडे…” ☆ सुश्री संध्या बेडेकर ☆

सुश्री संध्या बेडेकर

? विविधा ?

☆ “ज्येष्ठत्वाकडून श्रेष्ठत्वाकडे…” ☆ सुश्री संध्या बेडेकर ☆

 सहजच मनातल शब्दात – जेष्ठत्वाकडून श्रेष्ठत्वाकडे

ज्येष्ठत्व म्हणजे वय वर्ष ६० च्या नंतरचा काळ. आजकाल लाईफस्पॅन वाढले आहे. त्यामुळे हा काळ पण चांगला लांबलचक असू शकतो. फक्त थोडा वेगळा, म्हणजे आतापर्यंत व्यतीत केलेल्या काळा पेक्षा वेगळा.

श्रेष्ठत्व म्हणजे आपले काम /नोकरी, पद, हुद्दा यात वरच्या पायरीवर असणे.

ज्येष्ठत्वाकडून श्रेष्ठत्वाकडे ही वाटचाल येथे याचा अर्थ, माझ्या मते त्यांच्या विचारांचा दर्जा, त्यांची वागणूक, त्यांचे एकंदर सोशल लाईफ, घरच्यांशी संबंध, तडजोड, समाजात त्यांचे वावरणे, समाजाप्रती त्यांची जबाबदारी मुख्यतः रिटायर्ड लाईफस्टाईल. कसे जगतात? या गोष्टींचा प्रामुख्याने समावेश होतो.

या सर्व गोष्टी ज्येष्ठांच्या श्रेष्ठत्वाचे मोजमाप करणारे पॅरामीटर्स आहेत.

वयाच्या साधारण पंचविसाव्या वर्षांपासून नोकरी करणारा माणूस किंवा स्त्री जेंव्हा वयाच्या अठ्ठावन किंवा साठाव्या वर्षी रिटायर्ड होते, तेंव्हा एक वेगळेच जग त्यांच्या समोर असत.

आता पर्यंत नोकरी, पगार, मानसन्मान, बिझी लाईफ, एक ठराविक दिनचर्या अचानक एक दिवस सर्व बंद होणार, ही गोष्ट सर्वांच्या बाबतीत खरी असली तरी पचायला जड असते. दिवसभर बाहेर राहण्याची सवय असल्याने, पूर्ण वेळ घरी राहणे जमत नाही. अचानक मिळालेला रिकामा वेळ कसा काढायचा? हा प्रश्न सोडविणे सोपं काम नाही. Post retirement manage करायला शिकावेच लागेल. दुसरा पर्यायही नाही.

या post retired management वरच तुमचे श्रेष्ठत्व अवलंबून असते.

एव्हाना घरातील चित्र ही बदलेले असते. घरात सून आलेली असते, मुल आपापल्या कामात बिझी असतात. खरं तर History Repeat होतं असते. दिवसभर घराबाहेर राहणाऱ्या ला आपलेच घर नव्याने दिसते. घरातील सकाळ ते संध्याकाळ पर्यंत घडणाऱ्या घटनांना तो प्रथमच दररोज बघत असतो. घरातील अगदी सामान्य घडणाऱ्या गोष्टी बघून घरातील प्रमुख व्यक्तीला म्हणजे मला आता दुय्यम स्थान मिळतय की काय? अशी शंका मनात येऊ शकते.

बाबा! तुम्हाला घरातच रहाचंय ना, मग घाई करू नका. थांबा जरा.

अहो! तुम्ही नंतर जा ना आंघोळीला.

जरा थोड्या वेळ थांबा. मुलांचे डबे झाले की देते चहा तुम्हाला.

अशी अगदी साधी वाक्यं जरी कानावर पडली तर ती मनाला लागतात.

आता नोकरी नाही ना मला, तर मला कोणी विचारत नाहीये, आता माझी या घरात किंमत राहिली नाही. आधी असं कधी कोणी काही म्हंटल नाही. हा एक निगेटिव्ह विचार तुमची मानसिक शांतता घालवू शकतो. विचारांची दिशा बदलू शकतो

असे विचार म्हणजे तुमची श्रेष्ठत्वाकडे वाटचाल नाही तर खडूस म्हातारा कॅटेगरीत आपली मेंबरशीप नोंदविण्याची तयारी तुम्ही स्वतः च करत आहात एवढं नक्की. आणि त्याबरोबरच पूढच्या संभावित कठीण दिवसांच्या दस्तावेजां वर तुम्ही स्वतः च सही करत आहात. हे लक्षात असू द्यावे.

जेष्ठत्वाबरोबर श्रेष्ठत्व सांभाळणे तेवढं सोपं काम नाही.

एका स्त्रीला हा काळ तेवढा कठीण नसतो कारण नोकरी करत असतानाही ती होम फ्रंट वर काम करत होतीच. फक्त सूनेबरोबर जमायला हवं. माझ्या पेक्षा लहान छान, हुषार, शिकलेली मुलगी माझी स्पर्धक नाही तर माझ्या बरोबर या घराची जबाबदारी घेणारी आहे. माझ्या मुलाची यापुढे मला काळजी करायची गरज नाही. आम्ही दोघी म्हणजे नवीन आणि जून्या चे combination आहे. मी पारंपरिक तर ती नवीन आधुनिक. मस्त मजा करू आम्ही. दोघी मिळून छान घर सांभाळू.

हा एक विचार सहजच तुमचा दर्जा वाढवेल.

बरे असो,

आयुष्याचा आतापर्यंतचा काळ व्यवहाराचा होता, जेष्ठत्वाचा काळ भावनांचा, नात्यांचा असतो. डोळ्यापुढे काहीही goal नसताना दिवस घालविण्यासाठी पुन्हा एकदा काही तरी नवीन करण्याचा, वेळेचे, कामाचे नियोजन करण्याची आवश्यकता असते..

I am retired from work not from Fun.

हे लक्षात ठेवून Rethink, Rebuild, Redesign करून पूढची जीवनशैली Reset करायची वेळ असते.

तुम्ही आपल्या नोकरीत किती ही हुषार, उच्च पदावर असला तरी ही post retirement management ची परीक्षा वेगळीच आहे, याचा सिलेबसही वेगळाच. यात Ego, Maths या विषयात नापास झाले तरच distinction मिळते. येथे व्यवहार नाही दृष्टीकोन महत्वाचा असतो.

आता घरचा प्रमुख असला तरी नवीन पीढी ला बरोबर समजून त्यांच्या बरोबर चालायची जबाबदारी असते. आता कधी सारथी, कधी senior advisor ची भूमिका करायची असते.

मी म्हणेन तेच, तसंच, मी बोलणार तुम्ही ऐका, I know everything असा हेकेखोर पणा जेवढा कंट्रोल मध्ये ठेवता येईल तेवढंच जीवन सुखकर होत. घरातील आणि घराच्या बाहेरही.

 तुम भी चलो हम भी चले, चलती रहे जिंदगी हा approach असावा.

लग्नानंतर नवलाईचे नऊ दिवस संपल्यावर तुम्ही दोघे किती तरी वर्ष आपापल्या जबाबदाऱ्या पूर्ण करण्यातच बिझी होता. आपल्या अर्धांगिनी बरोबर quality time spend करण्याचे दिवस पुन्हा एकदा अनुभवायचे आहेत. सहजीवन पार्ट II पण मजेतच जगायचा आहे ना.

ते जाऊ दे

तुम्ही स्वतः तरी या आधी मनसोक्त स्ट्रेस फ्री आयुष्य जगला आहात का? वर्षानुवर्षे घड्याळाच्या काट्या कडे बघत दिवस काढले. किती तरी चांगले कार्यक्रम ऑफिस मध्ये महत्वाचे काम आहे म्हणून अटेंड केले नाही.. आजारी असतानाही महत्वाची मिटिंग आहे म्हणून ऑफिसात गेला आहात.

रिटायर्ड झाल्यावर घरचे वातावरण तर ऑफिस पेक्षा नक्कीच चांगले स्ट्रेसफ्री असणार आहे. येथे तुमचे स्पर्धक नाही तर तुमची आपली माणसं आहेत. येथे तुमचे पाय ओढणारे कोणी नसेल.

आज जेंव्हा ज्येष्ठत्वाकडून श्रेष्ठत्वाकडे जायची तयारी करायची आहे, तेंव्हा या सर्व गोष्टींचा विचार करा आणि मग काय ते ठरवा. बिनधास्त जगण्याचा हा काळ आहे.

ज्येष्ठत्वाकडून श्रेष्ठत्वाकडे जाताना खूप काही मोठे मेहनतीचे काम करायची गरज नाही. भारी वजन वगैरे उचलावे लागत नाही. शारीरिक कसरत नाही, पण मानसिक कसरत करायची गरज मात्र असते.. फक्त थोडासा वेगळा विचार करायची गरज आहे. सवयीत थोडे बदल करायची गरज आहे.

विचारांचे मॅनेजमेंट जमले तर, retired आयुष्याचे मॅनेजमेंट जमलेच म्हणून समजा.

थोडक्यात काय ज्येष्ठत्वात पाऊल टाकले की एक वेगळीच नियमावली तयार करायची असते. आता खडूस म्हातारा की graceful आजोबा कोणत्या संघात प्रवेश घ्यायचा हे स्वतः च ठरवायचे असते.

या नियमावली वरच तुमचं श्रेष्ठत्व अवलंबून असते. अशी नियमावली आयुष्यात बऱ्याच टप्प्यावर करावीच लागते. नोकरी लागल्यावर, घरी बाळाचा जन्म झाल्यावर.

मी असाच आहे. असं म्हणून चालणार नाही.

Growing old is mandatory but getting old is optional.

अगदी म्हाताऱ्या माणसारखं वागायची काहीच गरज नाही. म्हातारपण graceful पण नक्कीच असू शकत. आपले छंद जोपासण्याची हीच तर ती वेळ आहे.

स्वतः वर थोडे नियंत्रण ही ठेवावे लागते. आजपर्यंत घरची कामं केली नाही, पण आता वेळ आहे तर केली तर काय हरकत आहे.? तुमच्या मुळे कोणाला हातभार लागत असेल, मदत होत असेल तर काय हरकत आहे.?

भाजी चिरणे, कपडे मशीन मध्ये लावणे, सर्वांसाठी चहा करणे, नातवांना गोष्टी सांगणे, त्यांचा अभ्यास घेणे, त्यांना खेळायला बाहेर घेऊन जाणे.

म्हणतात ना

धुन बदलके तो देखो,

या सर्व कामांचा आनंद वेगळाच आहे.

मोठेपणा गाजवायचा नसतो तो वागण्यात दाखवायचा असतो.

तुमचा मुलगा सून तुमचे प्रतिस्पर्धी नाही. त्यांच्या भानगडीत जास्त पडू नये. सारखं टोकू नये. त्यांच्या खर्चावर लक्ष देऊ नका. नवीन जनरेशन आपल्या पेक्षा हुषार आहे, ते आपलं मॅनेज करतील पढे लिखे बुद्धु. असं कोणी म्हणायला नको असेल तर आपल्या पैशाचे व्यवस्थापनही व्यवस्थित करायला हवच. नटसम्राट चे उदाहरण मात्र लक्षात असू द्यावे.

नवीन जगात वावरताना रोजच्या नवनवीन होणार्या frauds बद्दल जागरूक रहाव लागेल.

घराबाहेरील जगाशी पण वागताना पुन्हा लक्षपूर्वक माईंडसेट तयार करावा लागेल.

तेथे तर वेगवेगळ्या लोकांशी संबंध येणार आहे. बोलण्यापेक्षा ऐकण्याचे काम केले तर समोरच्या व्यक्तीला समजणे सोपे होते. समजदार व्यक्ती खूप ज्ञानी आणि मुर्ख व्यक्ती समोर शांत बसतो. भाजीवाला, रिक्षा चालकांनी हुज्जत घालण्यापेक्षा त्याला चार पैसे जास्त दिले तर हरकत नाही. कोणाचे काही चांगलं दिसलं तर कौतुक करायची सवय लावावी. त्यांना तर आनंद होतोच, आपल्याला पण चांगलं वाटतं.

लोकांना माझी गरज आहे की नाही माहीत नाही पण मला लोकांची गरज आहे.

हा एक विचार मनात ठेवला तर सर्वांबरोबर सहज जमत.

जेष्ठ नागरिक संघ, वाचक मंच, आपल्या आवडीनुसार यांचे सदस्यत्व घेतले तर आपोआपच चार लोकांशी ओळख होते, तुम्हाला पण तुमच्या सुप्त इच्छा पूर्ण करायची संधी मिळते. यासर्व गोष्टींमध्ये स्वतः पूढाकार घ्यावा लागतो.

एकंदरीत वाढत्या वयाबरोबर ज्येष्ठत्व तर आपोआपच मिळत, श्रेष्ठत्व मिळवायला स्वतः चे प्रयत्न करावे लागतात. मानसिक स्वास्थ्यासाठी पण हे गरजेचे असते.

म्हणतात ना,

संसार को बदलने की कोशिश मत करो, स्वयं को बदलो.

रस्त्यावर दगड असले तर आपण रस्त्यावर कार्पेट नाही टाकत, पायात चपला घालतो.

तुमच्या आयुष्यात आनंदी राहण्याची जबाबदारी तुमची स्वतः ची आहे. आपल्या आयुष्याची किल्ली दुसऱ्याच्या हातात कधीच देऊ नये.

आपल्या मनात, सवयीत, वागणुकीत असे विचार ठेवले तर सहजच

हे आजोबा आपले ज्येष्ठत्व छान सांभाळतात. मी पण म्हातारा झालो की असंच वागणार. असे comments नक्की मिळतील.

You will set an example for others.

सिर्फ सूरज के निकलनेसेही सवेरा नहीं होता।

विचारों के बदलनेसे भी नया दिन / नया दौर शुरू होता है।

© सुश्री संध्या बेडेकर 

पुणे

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ हे तर ‘जीवनदान’…  लेखक : अज्ञात  ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆

सौ. गौरी गाडेकर

? जीवनरंग ?

☆ हे तर ‘जीवनदान’…  लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर

“मॅडम, फुकटचे पैसे नकोत, गजरा घ्या… आज माझा ‘दुसरा वाढदिवस’ आहे! ” सिग्नलवरच्या पोराचे शब्द ऐकून एसी कारमध्ये बसलेल्या करोडपती आईने थेट रस्त्यावरच हंबरडा फोडला!

पुण्यातील चांदणी चौकातील सिग्नलवर दुपारच्या कडक उन्हात गाड्यांची रांग लागली होती. एका आलिशान ‘ऑडी’ (Audi) कारमध्ये ३५ वर्षांच्या ‘अनुराधा’ डोळ्यांवर गॉगल लावून बसल्या होत्या. पण त्या गॉगलच्या आतून त्यांचे डोळे सतत रडत होते.

आज ‘१५ एप्रिल’. बरोबर तीन वर्षांपूर्वी याच दिवशी अनुराधा यांचा ७ वर्षांचा एकुलता एक मुलगा, ‘अंश’ एका भयंकर अपघातात त्यांना सोडून गेला होता. अंश ‘ब्रेन डेड’ (Brain Dead) झाला होता, आणि एका धाडसी निर्णयापोटी अनुराधा आणि त्यांच्या पतीने अंशचे सर्व अवयव (Organs) दान केले होते. आज अंशचा स्मृतिदिन होता. अनुराधा अत्यंत निराश अवस्थेत अनाथाश्रमाला देणगी देऊन घरी परतत होत्या.

– – तो सिग्नलवरचा प्रसंग आणि एक १० वर्षांचा मुलगा :

सिग्नल लाल झाला. उन्हाच्या झळा लागत होत्या. तेवढ्यात एक १०-११ वर्षांचा, घामाने डबडबलेला पण अत्यंत गोड चेहऱ्याचा मुलगा अनुराधा यांच्या कारच्या काचेवर टकटक करू लागला. त्याच्या एका हातात मोगऱ्याचे गजरे होते आणि दुसऱ्या हातात पाण्याचा रिकामा ग्लास.

अनुराधा यांना भयंकर चिडचिड झाली. त्यांनी रागाने काच थोडी खाली केली आणि पर्समधून ‘५० रुपयांची’ नोट काढून त्याच्या अंगावर फेकत म्हणाल्या,

“हे घे पैसे आणि जा इथून! मला कोणताही गजरा नकोय, आणि मला कुणाशीही बोलायचं नाहीये. “

पण त्या मुलाने ती ५० ची नोट उचलली नाही. तो अत्यंत स्वाभिमानाने काचेजवळ आला आणि म्हणाला,

“मॅडम, माझी आई म्हणते की फुकटचे पैसे कधीही घेऊ नयेत, त्याने पाप लागतं. मी भिकारी नाहीये, तुम्ही एक गजरा घ्या, मगच मी हे ५० रुपये घेईन. “

त्याच्या आवाजातील निरागसपणाने अनुराधा यांचे लक्ष वेधून घेतले. त्यांनी डोळ्यांवरचा गॉगल काढला आणि त्या मुलाकडे पाहिले. त्याचा चेहरा खूप शांत आणि हसरा होता.

अनुराधा यांनी विचारले, “एवढ्या उन्हात तू गजरे का विकतोयस? शाळा नाहीये का तुझी? “

– – तो सत्याचा स्फोट आणि अश्रूंचा बांध फुटलेला क्षण :

मुलगा गोड हसून म्हणाला,

“शाळा सकाळची असते मॅडम. पण माझी आई लोकांची धुणी-भांडी करते. माझ्या आईवर खूप मोठं कर्ज आहे, म्हणून मी तिला मदत करतो. आणि तसंही मॅडम… आज माझा ‘दुसरा वाढदिवस’ आहे! “

अनुराधा यांना काहीच समजले नाही. “दुसरा वाढदिवस? म्हणजे काय? “

मुलगा शर्टाची कॉलर थोडी बाजूला करत छातीवरची एक मोठी ‘सर्जरीची खूण’ (Operation Mark) दाखवत म्हणाला,

“मॅडम, तीन वर्षांपूर्वी माझ्या हृदयात भोक होतं. डॉक्टर म्हणाले होते मी मरणार! माझ्या आईने कर्ज काढून मला पुण्याला ‘सह्याद्री हॉस्पिटलमध्ये’ आणलं होतं. पण मला कोणीतरी देवदूत भेटला! बरोबर तीन वर्षांपूर्वी, ‘१५ एप्रिलला’ एका लहान मुलाचा अपघात झाला होता… आणि मॅडम… त्या मुलाचं धडधडणारं ‘हृदय’ (Heart) डॉक्टरांनी माझ्या छातीत बसवलं! त्या देवासारख्या मुलाने मला जीवन दिलं, म्हणून आज माझा दुसरा जन्मदिवस आहे! “

… हे शब्द ऐकताच अनुराधा यांच्या पायाखालची जमीनच सरकली! त्यांचा श्वास अक्षरशः कोंडला गेला! ‘सह्याद्री हॉस्पिटल’, ‘१५ एप्रिल’ आणि ‘हृदय प्रत्यारोपण’…

अनुराधा यांनी थरथरत्या आवाजात विचारले, “बाळा… तुझं नाव काय आहे? “

मुलगा म्हणाला, “माझं नाव कबीर आहे मॅडम. “

– – काळजाला भिडणारा क्लायमॅक्स :

अनुराधा यांनी स्वतःच्या डोक्याला हात लावला. तीन वर्षांपूर्वी त्यांनी स्वतःच्या अंशचे हृदय ज्या ‘कबीर’ नावाच्या गरीब मुलाला दान केले होते… तोच कबीर आज त्यांच्या गाडीसमोर उभा होता!

अनुराधा वेड्यासारख्या गाडीचा दरवाजा उघडून भररस्त्यात खाली उतरल्या. त्यांनी त्या घामाने डबडबलेल्या कबीरला दोन्ही हातांनी घट्ट धरले. त्यांच्या डोळ्यांतून धाय मोकलून अश्रू वाहत होते.

“कबीर… बाळा, मला फक्त एक गोष्ट करू दे… ” असे म्हणत अनुराधा यांनी आपले कान आणि डोके कबीरच्या छातीवर ठेवले.

धड-धड… धड-धड…

त्या गरीब मुलाच्या छातीत आज अनुराधा यांच्याच पोटच्या गोळ्याचे, त्यांच्या ‘अंशचे’ हृदय धडधडत होते! ज्या हृदयाचे ठोके तीन वर्षांपूर्वी थांबलेत असे त्यांना वाटले होते, ते ठोके आज या रस्त्यावर एका स्वाभिमानी मुलाच्या छातीत जिवंत होते!

… अनुराधा भररस्त्यात गुडघ्यावर बसून ढसाढसा रडू लागल्या. त्यांनी कबीरला घट्ट मिठी मारली. सिग्नल हिरवा झाला होता, गाड्यांचे हॉर्न वाजत होते, पण एका आईला आज तिचा हरवलेला देवदूत परत मिळाला होता!

त्याच दिवशी अनुराधा यांनी कबीरच्या आईला शोधून काढले. त्यांच्या डोक्यावरचे हॉस्पिटलचे संपूर्ण कर्ज एका झटक्यात फेडून टाकले आणि कबीरच्या शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेतली. कारण एका करोडपती आईचा ‘अंश’ आज एका गरीब पण स्वाभिमानी पोराच्या रूपात जिवंत होता!

… *पैशाचा माज विसरायला लावणारी आणि अवयवदानाचे महत्त्व आणि आवश्यकता याबाबतचा (Organ Donation) एक अत्यंत पवित्र संदेश देणारी ही डोळ्यांत पाणी आणणारी घटना*


लेखक : अज्ञात 

प्रस्तुती : सौ. गौरी गाडेकर 

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ आशाताई.. गेलात…! – भाग – २ ☆ शीला पतकी ☆

शीला पतकी 

? मनमंजुषेतून ?

आशाताई.. गेलात…! – भाग – २ ☆ शीला पतकी 

आशाबाईंचे एक वैशिष्ट्य म्हणजे त्या सामान्य जीवन जगणं पसंत करायच्या स्वयंपाकाची विलक्षण आवड.. लोकांना करून घालायची हौस बाजारात फिरून भाजीपाला आणण्याची हौस.. मला मंगला खाडीलकर यानी एकदा किस्सा सांगितला होता. त्या म्हणाल्या..

” एकदा आशा बाईंनी मला घरी बोलावलं मार्केटमध्ये जाऊन आम्ही भाजी घेऊन आलो अगदी भरपूर दोन पिशव्या भरून त्यांचे भाजीवाले ठरलेले. त्यांच्याशी उत्तम संवाद तोही त्यांच्या पातळीवर येऊन जणू काय त्या मैत्रिणी असाव्यात त्यानंतर घरी आल्यावर त्यांनी छान गरम भाकरी केली. ती टम्म फुगलेली भाकरी माझ्या पानात घालत त्या म्हणाल्या जेव त्याच्यावर लोण्याचा गोळा घातला आणि गरम भाकरी भाजी मला खाऊ घातली. ” असं अनेकांना आपल्या हातन करून खाऊ घालण्यात त्यांना खूप धन्यता वाटायची कारण त्यांच्यात एक छान गृहिणी लपलेली होती.

आपल्याला फक्त आवाजाची जादू असणारी आशा दिसते पण तसं नाही एक छान छोटी बहीण आपल्या अपंग असलेल्या भावावर नितांत प्रेम करणारी छोटी मुलगी हृदयनाथला सतत कडेवर घेऊन हिंडत असे ही आठवण खुद्द मंगेशकरांनी सांगितली ते म्हणाले, “आशा कधी कामाला मागे पडत नव्हती आम्ही आमच्या आजोळी आजीच्या घरी जायचं तेव्हा सगळ्यांचं टोपलं भर धुणं घेऊन आणि मला कडेवर घेऊन ती नदीवर जायची सगळ धुणं स्वच्छ धुऊन ती पाटी डोक्यावर घेऊन मला कडेवर घेऊन ती घरी येत असे आणि आजीला म्हणायची आजी मला खूप भूक लागली काहीतरी खायला दे त्यावर आजी त्यांना म्हणायची सारखं काय खायला लागतं ग तुला जा त्या डब्यात भाकरी आहेत तेल तिखट मसाला आहे घे आणि खा आणि तेल तिखट मसाला भाकरी हे जेवण अतिशय गोडीन त्या जेवत असत. ते म्हणाले तिने फार कष्ट काढले आहेत खूप संघर्ष केला आहे प्रत्येक गोष्टीची जबाबदारी तीने आपल्यावर घेतली आणि ती निभावली तिने खूप कष्ट केले आहेत”… हे सांगताना हृदयनाथांचा स्वर हळवा झाला होता हृदय नाथांना अखंड कडेवर सांभाळून घेणारी त्यांची बहीण आज गेली… सामान्य बाईचे दुःख भोगणारी वेदना सहन करणारी नवऱ्याच्या हिंसक वृत्तीला तोंड देणारी आणि त्यातून गरिबीत आपली मुले एका खोलीत राहून मोठी करणारी आशा पुढे महाराणी सारखी राहिली.

नकला करण्याचा एक विशेष गुण त्यांच्याकडे होता त्यामुळे बाबूजी आपल्याला कसे शिकवत असतात याची तर उत्तम नक्कल करायच्या ह्या गुणामुळे त्यांचे निरीक्षण खूप चांगले होते त्यामुळे पार्श्वगायनात आपलं गाणं कोणाच्या तोंडी जाणार आहे हे लक्षात घेऊन त्या गात असत हेलन बिंदू या कॅबिरे नृत्य करणाऱ्या अनेकांसाठी त्यांचा आवाज वरदान ठरला… त्यामुळे पिया तू अब तो आजा यासारखे गाणे आज आपण विसरू शकत नाही. लहान मुलांची ही गाणी त्यातही आशाताईंचा आवाज फिट होता. खतूबा ह्या गाण्यांमध्ये त्यांनी काढलेले वेगवेगळे आवाज हे गायन कलेच्या पलीकडचे होतेहे गाणे अलीबाबा चालीस चोर या चित्रपटातले असून पंचमदा त्यांच्या अनेक प्रयोगापैकी एक आहे गाण्याची सुरुवात अशी अरेबियन वगैरे हवी होती तेव्हा त्यांनी अरबी लोक लोकनृत्य करताना कसे ओरडतात ते पाहून त्या गाण्याची सुरुवात कशी केली… ते काही कवीने लिहिलेलं नव्हतं किंवा संगीतकाराने पण सांगितलेलं नव्हतं… तो त्यांचा स्वतःचा शोध होता. कवीचे शब्द आपल्या गाण्यातून लोकापर्यंत पोहोचवून त्याला न्याय देणं हे तर त्यांनी केलंच आहे पण शब्दशिवाय नुसत्या हमिंग वरती गाण म्हणलय देवानंद आणि नूतन सोबत चे एक गीत त्यामध्ये देवानंदला शब्द आहेत पण नूतन गाते ते हमिंग वर आहे ते पूर्ण शब्दाशिवाय च गाणं संवादाविना बोलू असे झाले आहे. इतकी ताकत त्यांच्या स्वरात आहे. बाबूजीं बरोबर गायलेली असंख्य मराठी गीत आपल्या मनात आणि घरात गोडवा भरून गेलेले आहेत. काल शेलार यानी शेवटची केलेली क्लिप त्यामध्ये त्या म्हणतात. ” मला हे दत्तगुरु दिसले “ह्या गाण्याचा कडव त्यांनी गायलं आहे मला वाटतं खरंच त्यांच्या परमेश्वर दिसत असावा नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत त्यांनी सांगितलं होतं सगळं मिळालं पैसा अडका ऐश्वर्य प्रसिद्धी.. सगळं मिळवलं आता काही इच्छा नाही आता तृप्त आहे आता फक्त निघायचे… चार दिवसापूर्वी गाडगीळांशी बोलताना त्या म्हणाल्या माझ्या काही मुलाखत रेकॉर्ड केले असल्यास तर पाठव मला ऐकायचे आहेत आणि लवकर पाठव माझ्याकडे वेळ नाही बस एवढंच संभाषण झालं… मला वाटतं त्यांचा मृत्यू त्यांना समजला होता किंबहुना त्यांचं जगून झालं होतं. त्याना लक्षात आलंय असावे आणि म्हणून त्यांनी मनोमन परमेश्वराला हाक मारली असेल… जिवलगा राहिले दूर घर माझे, पाऊल थकले माथ्यावरती जड झाले ओझे… अशा माणसांना आपण कधी थकले आहोत असं समजत नाही कारण ती आपल्याला हवी असतात आणि आपण त्यांना कधी विचारले नाही की बाबा रे खरच तू थकला आहेस का? का असं होतं हे माहित नाही पण होतं माथ्यावरती एकटीने पेललेलं संघर्षाचे, दुःखाचं ओझं वागवत ही बाई अत्यंत आनंदाने जीवन जगत आली. तिने आपल्या मुलांना एकच सांगितलं होतं गरीबीत जन्माला आलो तरी गरीबीत मरायचं नाही कारण गरिबीच्या यातना त्यानी भोगल्या होत्या त्या वेळा पाहिल्या होत्या, तो संघर्ष लढला होता, अशा एका संघर्षमय जीवनाचा काल अकस्मिक शेवट झाला. कोणाकडून फारशी सेवा न करून घेता अगदी सहजपणे त्या आपल्यातून निघून गेल्या पण त्यांची हजारो गाणी संपूर्ण विश्वामध्ये गाजली आहेत ती चिरंजीव आहेत त्यातून त्या आपल्याला रोज भेटणारच आहेत

अंतिम क्षणाला ब्रम्हा विष्णू महेश या सृजनकर्त्यापालनकर्त्या आणि विनाशकर्या परमेश्वराचा गोड स्वरात धावा करून त्यांच्याबरोबर सहज निघून गेल्या.. त्यांचा अंश होण्यासाठी! .. कदाचित लताबाई त्यांना तिथे भेटल्या असतील लताबाई त्यानी तेथे स्वागत केलं असेल. “अशा ये आलीस खूप दमलीस ग.. ” असं म्हणून त्यानी तीला मिठीत घेतल असेल दोन्ही बहिणींचे हे अपूर्व मिलन स्वर्गस्थ देवतांनी पाहून त्यांच्यावर नक्कीच पुष्पवृष्टी केली असेल. आशाबाई अजून काही वेळाने तुमचं पार्थिव शरीर पंचतत्वात विलीन होईल. पण तुमचा पंचतत्त्वात मिसळलेला ध्वनी, गोड आवाज, कधीही संपणार नाही तुमच्या प्रार्थना शाळेतील मुल गातील प्रेमी युगुल तुमचे प्रेम गीत गातील आया तुमची अंगाई गातील रसिका तरुण तुमचे कॅबरे ऐकतील कुणीतरी एखादी सलज्ज तरुणी तुमचं निगाहे मिलाने को जी चाहता है मनापासून गाईल आणि आपल्या प्रेमाकडे सलज्य नजरेने चोरून पाहिल केव्हा तरी पहाटे फसवून रात गेली आभाळा चांदण्याचे उसवून रात गेली हे सगळं तुम्ही अजरामर करून गेलात… आशाताई तुमच्या जीवन संघर्षाला तुमच्या मेहनतीला संकटना तोंड देऊन ताठ मानेने उभा राहणाऱ्या वृत्तीला तुमच्या गोड फिरत असलेल्या गळ्याला आणि भूतकाळ न विसरता सामान्य माणसासारखे आयुष्य जगणाऱ्या सामान्य माणसाची कदर करणाऱ्या तुमच्यासारख्या थोर कलावंताला साष्टांग दंडवत! तुमचा फक्त देह गेलाय जो आम्ही तुम्हाला समोरून कधी बघितलं नव्हतं आमच्यासाठी तुम्ही आहातच. काया नाही तरी नादा ने आहात.. तुमचा आवाज त्या आवाजातली फिरत शब्दांचा टोकदारपणा सारसार आमच्या कानात घुमत राहणार आहे लते बरोबर आशा नावाच विश्वाला पडलेले एक स्वप्न आज चांदण्यात विरून गेल. पृथ्वीवर पडणारा प्रकाश अधिक प्रखरं करून गेलं.!

आशाताई भावपूर्ण श्रद्धांजली!!!!!

– समाप्त – 

© सुश्री शीला पतकी

माजी मुख्याध्यापिका, सेवासदन प्रशाला सोलापूर 

मो 8805850279

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ अर्थपूर्ण शब्दांजली… ☆ संगीता कुलकर्णी ☆

संगीता कुलकर्णी

? मनमंजुषेतून ?

☆ अर्थपूर्ण शब्दांजली ☆ संगीता कुलकर्णी ☆

*स्वरांची जादू, भावनांची भाषा आणि आयुष्याच्या प्रत्येक छटेचा अर्थ आपल्या गाण्यांतून सांगणाऱ्या आशा भोसले यांना ही अर्थपूर्ण शब्दांजली*…

भारतीय संगीतविश्वातील अजरामर स्वरसम्राज्ञी आशा भोसले यांना लेखरूपी श्रद्धांजली अर्पण करताना शब्द अपुरे पडतात कारण त्यांचा आवाज म्हणजेच भावना, जीवन आणि संगीताचा अखंड प्रवाह होय… त्यांच्या असंख्य गाण्यांतून त्यांनी प्रत्येक श्रोत्याच्या मनात एक वेगळी जागा निर्माण केली आहे.

आशा ताईंचा आवाज हा केवळ गाण्यांचा नाही तर तो काळाचा साक्षीदार आहे… आशाताईंचा आवाज म्हणजे भावनांचा अथांग सागर… आयुष्याच्या प्रत्येक क्षणाला स्पर्श करणारा अनुभव… “राधा ही बावरी” मधील निरागस प्रेम, “माझे माहेर पंढरी” मधील भक्तीभाव, आणि “चुरा लिया है तुमने” मधील खट्याळ रोमँटिकता “पिया तू अब तो आजा” मधील त्यांचा खट्याळ आणि चैतन्यशील अंदाज, “दिल चीज़ क्या है” मधील नजाकत… स्वतःला अर्पण करण्यातील सौंदर्य आणि “इन आंखों की मस्ती” मधील भावपूर्ण गूढता तर “दम मारो दम” मधून बंडखोर तरुणाईचा आवाज बनल्या… “झुमका गिरा रे” मधील खट्याळपणा आणि “ये मेरा दिल” मधील आत्मविश्वास या प्रत्येक गाण्यांतून त्यांनी स्वतःला वेगवेगळ्या रूपांत साकारलं… स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली.

त्यांच्या आवाजात एक विलक्षण लवचिकता होती जी कोणत्याही संगीत शैलीला सहजपणे कवेत घेत असे… प्रत्येक गाण्यातून त्यांनी जीवनातील विविध छटा जिवंत केल्या… वेगवेगळ्या भावनांना स्वर दिला.. त्यांचा स्वर कधी कोमल झुळूक बनून मनाला स्पर्श करतो तर कधी उत्साहाची लाट बनून अंगात जोश भरतो… प्रत्येक ठिकाणी त्यांनी आपल्या गायकीची वेगळी ओळख निर्माण केली…

मराठी संगीतातही त्यांचे योगदान तितकेच मोलाचे आहे. “चांदणे शिंपीत जाशी” सारख्या गाण्यांतून त्यांनी कोमल भावनांना सुरेल स्पर्श दिला. त्यांच्या आवाजातली गोडी, सहजता आणि भावस्पर्शीपणा यामुळे ही गाणी आजही तितकीच लोकप्रिय आहेत. त्यांनी केवळ गाणी गायली नाहीत तर प्रत्येक शब्दाला आणि भावनेला आत्मा दिला.. त्यांच्या गाण्यांमधूनच त्यांचे व्यक्तिमत्त्व उलगडत जाते सहज, बहुगुणी आणि सदैव ताजेतवाने…

त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी हजारो गाणी विविध भाषांमध्ये गायली… हिंदी, मराठी, बंगाली, गुजराती, पंजाबी अशा अनेक भाषांमध्ये त्यांनी आपल्या आवाजाची मोहिनी पसरवली… मराठी, हिंदी, गझल, पॉप—कोणतीही शैली असो आशाताई प्रत्येक ठिकाणी सहजपणे रुळल्या. त्यांच्या आवाजातली लवचिकता आणि भावनांची खोली यामुळेच त्यांची गाणी काळाच्या पलीकडे गेली.

संगीतकार आर. डी. बर्मन यांच्यासोबतची त्यांची जोडी विशेष गाजली. या जोडीने भारतीय संगीताला एक नवीन दिशा दिली, जिथे पारंपरिकतेसोबत आधुनिकतेचाही सुंदर संगम दिसून येतो.

आशाताईंची गाणी म्हणजे केवळ सूर नाहीत तर ती आपल्या आयुष्याच्या आठवणींशी जोडलेली भावना आहेत… कधी आनंदाचे क्षण, कधी विरहाचे दिवस, तर कधी स्वतःला शोधण्याचा प्रवास म्हणूनच त्या केवळ गायिका नाहीत तर आपल्या भावविश्वाचा अविभाज्य भाग आहेत… त्यांच्या प्रत्येक गीतात एक कथा आहे एक अनुभव आहे जो आपल्याला पुन्हा पुन्हा ऐकावासा वाटतो.

आशा भोसले यांचा आवाज हा काळाच्या पलीकडे जाणारा आहे. त्यांनी प्रत्येक पिढीला काही ना काही दिलं आहे कधी प्रेमाची गोडी, कधी विरहाची वेदना, तर कधी जीवनाचा उत्साह. त्यांच्या गाण्यांतून जीवनाच्या प्रत्येक भावनेला स्वर मिळाला आहे… आशाताईंची गाणी म्हणजे केवळ सुरावट नव्हे तर जीवनाचा आरसा आहेत… आशाताईंचा आवाज आपल्याला शिकवतो की आयुष्य एकसुरी नसते ते अनेक रंगांनी भरलेले असते. कधी हसू, कधी अश्रू, कधी प्रेम तर कधी एकांत.. या सगळ्यांना त्यांनी आपल्या गाण्यांतून स्वर दिला.

आज त्या आपल्या सोबत नसल्या तरी त्यांचा प्रत्येक स्वर अजूनही हवेत दरवळतो आहे… त्यांचा आवाज प्रत्येक सुरातून, प्रत्येक गाण्यातून आपल्याशी संवाद साधत राहील. त्यांच्या गाण्यांतूनच त्या सदैव जिवंत राहतील… मनात, आठवणीत, आणि प्रत्येक सुरांत… जीवनाला सुंदर बनवणारा एक मधुर स्वर बनून…

आज त्यांना अभिवादन करताना त्यांच्या गाण्यांतूनच त्यांची आठवण जिवंत ठेवणं हीच खरी आदरांजली ठरेल कारण त्यांचा आवाज कधीच थांबणार नाही तो प्रत्येक सुरात, प्रत्येक आठवणीत आणि प्रत्येक हृदयात सदैव घुमत राहील.

आशा भोसले या केवळ एक गायिका नाहीत तर त्या एक भावना आहेत…

संगीताच्या इतिहासात सदैव जिवंत राहणारी एक अमर स्वरकन्या…

©  संगीता कुलकर्णी 

लेखिका /कवयित्री

ठाणे मो. 9870451020

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares